दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १
पूर्वपिठीका
वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी. दरोजी अभयारण्याची चौकशी करुन झाली. अभयारण्यात दुपारी २ ते संध्याकाळी ६ इतक्याच मर्यादित वेळेत प्रवेश असतो आणि त्याच वेळेस अस्वलं दिसतात अशी पक्की माहिती मिळाली. मग विचार केला की तिथल्या जंगललॉज मध्ये राहण्यापेक्षा खुद्द हंपीनजीक राहून एक संध्याकाळ दरोजीसाठी राखीव ठेवावी. मग त्या दृष्टीने हंपीनजीक मुक्कामाची ठिकाणे शोधणे सुरु झाले. हंपीतील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरानजीक असलेल्या हंपी बाझार येथे काही होम स्टे'ज आहेत पण तिथे कार पार्किंगची व्यवस्था नाही. हंपीला येणारे पर्यटक मुख्यतः होस्पेटला मुक्काम करुन हंपी दर्शन करतात, होस्पेट मात्र १२ किमी लांब, त्यापेक्षा मग कमलापूर जे हंपी पासून (म्हणजे हंपीच्या मुख्य विरुपाक्ष संकुलापासून) चार किमी लांब आहे तेथील मयुरा भुवनेश्वरी ह्या कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसोर्टची माहिती मिळाली. एप्रिल/मे हा हंपीचा ऑफ सीजन असल्याने (कारण अतिशय कडक उन्हाळा) खोल्याही उपलब्ध होत्याच. अर्थात खोल्या उपलब्ध असल्या तरीही आमचं जाणं काही नीट ठरत नव्हतं. मित्रांचं स्केड्युल नीट जमत नव्हतं. शेवटी शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला हंपी़ला जायचं एकदाचं नक्की झालं आणि शनिवारी म्हणजे २९ तारखेला चिंचवडहून दुपारी निघायचं ठरलं. मग लगेच कमलापूरच्या रिसोर्टला एक खोली आरक्षित केली. आणि सर्व काही जमवून शनि दुपारी ३ च्या आसपास पुणं सोडलं.
हंपीला जायचे मुख्य मार्ग दोन. पहिला पुणे-कोल्हापूर-बेळगाव-धारवाड-हुबळी-गदग-होस्पेट-हंपी असा आणि दुसरा पुणे-सोलापूर-विजापूर- बदामी-बागलकोट -होस्पेट - हंपी असा. सोलापूरमार्ग किंचित जवळचा असूनही बेळगाव मार्गे निघालो कारण हा रस्ता अतिशय वेगवान आहे. कोल्हापूरला चहा घेऊन कित्तूरपासून थोडंसं पुढे जेवणासाठी एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबा घेतला. एकदा बेळगाव सोडलं तर हुबळी वगळता जेवायची सोय होणे थोडे अवघडच आहे. धारवाडला होते पण त्यासाठी हायवे सोडून शहरात शिरावे लागते. ढाबे अगदी कमी प्रमाणात आहेत. हुबळी सोडल्यावर थेट होस्पेटपर्यंत तर ढाबे अतिशयच कमी आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन प्रवास करताना जेवायच्या सोयीसाठी बेळगाव किंवा हुबळी उत्तम. कित्तूरनजीक जेवण करुन १२/१२:३० पर्यंत हुबळीस पोहोचलो. तिथे एका ज्युस सेंटरवर मिल्कशेथ विथ आईसक्रीम खाऊन पुढच्या प्रवासास लागलो. उत्तररात्रीचा प्रवास टाळायचा असल्याने शिरगुप्पीपासून पुढे आणि गदगच्या अलीकडे हुबळीपासून चाळीस/पन्नास किमी प्रवास करुन रात्री दी़डच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर गाडी लावली आणी गाडीतच आडवे होऊन २/३ तास झोप काढली. पहाटे पावणेपासच्या सुमारास पुन्हा प्रवास सुरु केला. दिडशे किमी अंतर राहिलं होतं. गदग-लकुंडी-कोप्पल असा प्रवास करुन होस्पेटला पोहोचलो तेव्हा सात वाजले होते. गदग, लकुंडीलाही भरपूर मंदिरे आहेत, परतीच्या प्रवासातही वेळेअभावी ती पाहता आली नाहीत.
होस्पेटपासूनच हंपीचे अवशेष दिसायला सुरुवात होतेच. हंपीच्या खडकाळ टेकड्या लक्षवेधी आहेत, तुंगभद्रा धरण, नदीचं मोठमोठ्या खडकांनी युक्त असलेलं पात्र, आजूबाजूला सतत दिसणारी लहानमोठी प्राचीन मंदिरे हे बघत बघतच साडेसातच्या सुमारास कमलापूरला पोहोचलो. कमलापूरच्या अलीकडेच एका रस्त्याच्या एका बाजूला एक बंधारा आहे. बंधार्याच्या एका बाजूला उन्हाळ्यात पाणी आटल्याने पूर्ण दलदलीचा प्रदेश आणि दुसर्या बाजूला केळीच्या गच्च बागा. आजचा रस्ता ह्या बंधार्यावरुनच गेलेला आहे. हा बंधारा विजयनगरच्या राजांनी बांधलेला असून त्याचे पाणी हंपीत खेळवलेले आहे. असे कित्येक बंधारे येथील आसपासच्या प्रदेशात त्या महान राजवटीत बांधले गेलेले आहेत.
कमलापूरला मयुरा भुवनेश्वरीत जाऊन खोली ताब्यात घेतली आणि छानपैकी तासभर झोप काढली आणि आवरुन हंपी बघायला निघालो. हंपी बघायला कशी आणि कुठून सुरुवात करायची ह्याची कसलीही योजना न आखल्याने आणि स्थलदर्शनाचा नकाशाही जवळ नसल्याने मन मानेल तसं भटकायचं असा विचार केला आणि कमलापूर येथील हंपी गेटमधून आत शिरलो.
हंपी: दिवस पहिला
हंपी म्हणजे रामायणात उल्लेख असलेले पंपाक्षेत्र. तुंगभ्रद्रा नदीचे पूर्वीचे नाव पंपा, त्याचाच अपभ्रंश होऊन पंपाचे हंपी हे नाव रूढ झाले. इकडील सर्व टेकड्यांची नावेही रामायणात उल्लेख असलेलीच. उदा. मातंग, गंधमादन, अंजनेय टेकड्या. हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीच्या टेकड्यांमध्ये विजयनगर हे शहर वसवले ते हरिहर आणि बुक्कराय ह्या दोघांनी त्यांच्या गुरुंची, स्वामी विद्यारण्यांची प्रेरणा घेऊन. हे हरिहर आणि बुक्कराय होयसळ राजा बल्लाळ ह्याच्या पदरी होते. इस्लामच्या वावटळीत होयसळ राजवट संपुष्टात आल्यावर ह्या दोघांनी होयसळांचे सरदार, आप्त इत्यादिंच्या पाठिंब्याने हिंदू धर्म आणि हिंदू राजवटीच्या पुनरुत्थान करण्याच्या इर्षेने विजयनगर ही राजधानी स्थापन केली. पहिल्या हरिहराचा काळ हा राज्य स्थिरस्थावर करण्यात गेला, ह्याचानंतर गादीवर आला तो ह्याचा भाऊ बुक्कराय. ह्याच्या राजवटीत विजयनगरचा राज्यविस्तार होत जाउन राज्य समृद्ध होत गेले आणि सर्वबाजूंनी घेरुन असलेल्या मुसलमानी सत्तांवर विजयनगरची दहशत बसायला सुरुवात झाली. विजनगरच्या राजकीय इतिहासात ४ घराणी झाली. हरिहर/बुक्करायाचे संगम घराणे, साळुव नरसिंहाचे साळुव घराणे, तुळूव नरसिंहाचे (नरसा नायक) तुळूव घराणे आणि अलिय (जावई) रामरायाचे अराविडू घराणे. तुळूव घराण्यातच विजयनगरचा सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला तो म्हणजे कृष्णदेवराय. अर्थात हंपीचा इतिहास सांगणे हा ह्या लेखाचा उद्देश नाही. जयंत कुलकर्णी काकांनी हा इतिहास आपल्या अप्रतिम लेखमालेद्वारे मिपावर ह्याआधीच आणलेला आहे. मी फक्त इथले अल्पसे स्थलदर्शन ह्या लेखमालेद्वारे घडवून आणणार आहे.
आमच्याकडे नकाशा नसल्याने आम्ही मनमुराद भटकत होतो, त्यामुळेच काही वेगळी ठिकाणे पाहता आली. इतरांच्या सोयीसाठी हा मुख्य नकाशा खाली देत आहे त्यानुसार नीट योजना आखल्यास कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणे पाहता येतील.
हंपी स्थलदर्शन नकाशा www.hampi.in ह्या संस्थळावरुन साभार.
चंद्रशेखर मंदिर
कमलापूर गेट मधून हंपीत प्रवेश करता करताच उजव्या हाताला एक मंदिर लक्ष
वेधून घेतं ते म्हणजे चंद्रशेखर मंदिर. तिकडे जाण्यासाठीडांबरी रस्ता सोडून
उजवीकडे कच्च्या रस्त्यावर गाडी घेताच एकाएकी असंख्य अवशेष दिसू लागतात
आणि हंपीचं विराट, ओसाड, भग्न स्वरुप सामोरे येते.
चंद्रशेखर मंदिर जरी कमलापूरला सर्वात जवळ असलं तरी हे हंपीच्या मुख्य
ठिकाणांपासून लांब असल्याने बरेचसे दुर्लक्षित आहे. त्यामुळे इकडे अजिबात
गर्दी नसते. हे मंदिर राजवाडा परिसरात (Royal Enclosure)गणले जाते. तरीही
ते शाही ठिकाणांपासून लांबच आणि एका कोपर्यात असल्याने खूपच दुर्लक्षित
आहे. हे मंदिर साधारण १६ व्या शतकात बांधले गेले. इकडील मुख्य मंदिरांवर
गोपुरे दिसतात. सम्राट कृष्णदेवरायाने ही गोपुरे बांधवून घेतली
असल्याकारणाने त्यांना रायगोपुरे असे म्हटले जाते.
चंद्रशेखर मंदिर
इकडील जवळपास सर्वच मंदिरांची शैली एकसारखी आहे. गोपुर, मंदिराचे आवार,
वाद्यमंडप, सभामंडप, दोन्ही बाजूंस असलेले अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह.
गोपुर तसंच कळसांची बांधकामं ही मातीच्या भाजलेल्या वीटांची आहेत. विटकामामुळे त्यांची बरीच हानी झालेली दिसते.
चंद्रशेखर मंदिराचे गोपुर
गोपुरांवर विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात.
मुख्य मंदिर परिसर
मंदिराचा बाह्यभाग
सभामंडपात नक्षीदार स्तंभ असून त्यावर व्याल, बाळकृष्ण, गायी, वानरं, तसंच इतरही अनेक वेगवेगळ्या मूर्ती, नक्षी इत्यादींचे कोरीव अंकन केले गेले आहे.
सभामंडप
घोंगडी पांघरलेल्या गुराख्याची मूर्ती लक्षवेधी आहे.
एका स्तंभावर गायवासरु कोरलेले आहे. हंपीतल्या बहुतेक सर्वच मंदिरात हे शिल्प दिसते.
स्तंभांवरची अजून काही शिल्पे
--
ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर समोरच दिसते ते सरस्वती मंदिर
सरस्वती मंदिर
सरस्वती मंदिर
हे मंदिर एका अतिशय लहानश्या अशा टेकडीवर किंबहुना दगडाच्या ढिगार्यावर वसलेलं आहे. हे एक लहानसे मंदिर असून ते किंचित उंचावर असल्याने येथून राजवाडा परिसराचे कित्येक अवशेष दिसतात.
सरस्वती मंदिराच्या प्रवेशद्वारातून दिसणारे अवशेष
सरस्वती मंदिर
हे मंदिर मूळचं वैष्णव असून १५५४ सालच्या शिलालेखाप्रमाणे हे तिरुवेंगलनाथ ह्या नावाने ओळखले जात होते. कालांतराने ह्या मंदिराला सरस्वती मंदिर हे नाव पडले. मात्र मुख्य वैष्णव मंदिराची ओळख अजिबात लपत नाही. मंदिरातील स्तंभांवर कृष्ण, विष्णू, दशावतार, गोपिका वस्त्रहरण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत तसेच गाभार्यातही गरुड मूर्ती कोरलेले एक पीठ आहे, त्यावर विष्णू अर्थात तिरुवेंगलनाथाची उभी मूर्ती असणार हे निश्चित.
गोपिका वस्त्रहरण प्रसंग--
--
मत्स्यावतार
गर्भगृहातील विष्णूमूर्तीचे पीठ
सरस्वती मंदिरातून बाहेर येताच उजव्या हातास आहे ते अष्टकोनी स्नानगृह
अष्टकोनी स्नानगृह
हे एक अष्टकोनी आकारातलं प्रचंड मोठं स्नानगृह आहे. स्तंभयुक्त मंडप, आत उतरती रचना, पाणी खेळवण्यासाठी बनवलेले दगडी चॅनेल्स. मध्यभागी एक रुंद स्तंभ (ह्यावर पूर्वी कारंजे असावे) अशी याची रचना. चंद्रशेखर मंदिरापासून एका रेषेत हे साधारण पाऊण किलोमीटर अंतरावर आहे.
अष्टकोनी स्नानगृह
स्नानगृह जवळून
अष्टकोनी स्नानगृहाचा मुख्य भाग
स्नानगृह परिसरातून दिसणारा हंपीचा रुक्ष, ओसाड, भग्न प्रदेश
ह्यानंतर आम्ही निघालो ते राजवाडा परिसर पाहायला. सरस्वती मंदिरापासूनच पुढे अर्ध्या/पाऊण किलोमीटर अंतरावर हा ठिकाण आहे. तटबंद असलेला हा राजवाडा परिसर (Royal enlcosure) हा जवळपास असंख्य विविध प्रकारच्या इमारतींचा समुच्चय, विजनगरच्या राजधानीचे केंद्र, विजयनगरचा दसरा, दिवाळी तसेच इतरही सण, उत्सव साजरे होणारा महत्वाचा परिसर, त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
राजवाडा परिसर- भाग २
सरस्वती मंदिरापासून एक कच्चा रस्ता जातो तो राजवाडा परिसराकडे. तसं बघायला गेलं तर चंद्रशेखर मंदिर आणि सरस्वती मंदिर राजवाड्याच्या परिसरातच येतात पण तुलनेने ते तेथून काहीसे लांब आहेत. राजवाडा परिसर (Royal enclosure) हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं, विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली, विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील येथेच. विजयनगरचं एक सर्वांगसुंदर मंदिरही ह्याच परिसरात, आजही कर्नाटकात महत्वाचा समजला जाणारा दसरा उत्सव होई तो इथेच. विजयनगर परिसरात लांबवरुन आणलेल्या दगडी कालव्यांतील पाणी जमा होई ते इथेच. साहजिकच ह्याच परिसराची राक्षसतंगडीच्या लढाईनंतर सर्वाधिक हानी झाली. आज दिसतात त्या इमारतींचे केवळ अवशेष उरले आहेत तरीही येथील पूर्ववैभवाची कल्पना हा परिसर पाहताना नक्कीच येते. ह्या भग्न इमारतींमध्ये आजही एक इमारत तिच्या मूळच्या स्वरुपासकट उभी आहे ती म्हणजे महानवमी डिब्बा
राजवाडा परिसराचे भग्नावशेष
राजवाडा परिसराचा नकाशा (www.hampi.in संस्थळावरुन साभार).
महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल
महानवमी डिब्बा अर्थात ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र. महानवमी डिब्बाच्या समोरील पटांगणात दसरा महोत्सवाचे कार्यक्रम होत असत आणि विजयनगरचे सम्राट ह्याच इमारतीवर उच्चासनावर बसून त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत असत.
विजयनगरच्या नवरात्र महोत्सवाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्या इमारतीचे वर्णन कसे करतो ते बघा.
...चौकाच्या उत्तरेकडील डाव्या बाजूस एक मोठी एकमजली इमारत आहे. ही इमारत हत्तीच्या आकाराच्या आणि इतर अनेक चित्रे कोरलेल्या खांबांवर उभी आहे. इमारतीचा दर्शनी भाग मोकळा असून एका दगडी जिन्याने लोक वर जातात. इमारतीच्या खाली सभोवार चिरेबंदी फरशी असून उत्सव पाहण्यासाठी आलेले काही लोक तिथे उभे राहतात. ओरियाच्या (ओरिसा) राजास जिंकून युद्धावरुन परत आल्यावर कृष्णदेवरायाने हा राजवाडा बांधला म्हणून त्यास विजयमहाल म्हणतात. चौकाच्या उजव्या बाजूस अरुंद पण लाकडी मचाणे बांधलेली होत. ती भिंतीच्या तटावर जात इतकी उंच होती. त्यांच्या वरच्या बाजूस लाल हिरवी मखमल लावलेली असून सर्वत्र खाली-वर सुंदर कापडाने ही मचाणे सजवलेली होती...ही लाकडी मचाणे एकूण अकरा असून फक्त उत्सवासाठीच ती उभारण्यात येतात, एरवी नाही. दरवाजासमोरील दोन वर्तुळाकार आकारात सोन्यामोत्याचे व जवाहिराचे अलंकार घातलेल्या नर्तिका होत्या...इमारतींवर जाण्याला दोन सुरेख घोटीव दगडाचे जिने आहेत. पैकी एक मध्यभागी असून, दुसरा टोकाला आहे. ह्या इमारतीचे सर्व खांब, भिंती आणि छत भारी कापडाने मढवलेले आहे. भिंतीवरील कापडावर वेलबुटीचे नक्षीकाम केलेले आहे. या इमार्तींना एकावर एक असे दोन चबुतरे आहेत. चबुतर्यांवर शिल्पकाम सुंदर असून त्यांच्या बाजूवर कोरीव काम आहे. ह्या चबुतर्यांवर राजाच्या मर्जीतील लोकांची मुले आणि त्यांच्या पदरचे हिजडे उत्सव पाहण्यासाठी येतात. यापैकी वरच्या चबुतर्यावर राजाच्या जवळ क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुला याला बसवले होते. आम्हीही त्याच्या बरोबर होतो. सगळा उत्सव आणि समारंभ नीट दिसेल अशा ठिकाणी क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुलाला बसवण्यात यावे अशी राजाची आज्ञा होती.....
यानंतर पाईश तेथील महोत्सवाचे वर्णन करतो जे मूळातूनच वाचण्यासारखे आहे. पाईशचे वर्णन जालावर उपलब्ध आहे.
महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल ही आयताकृती उंच इमारत असून ती मागच्या बाजूला काही प्रचंड शिलाखंडाच्या आधाराने उभी आहे. इमारतीच्या बाहेरच दोन प्रचंड मोठे दगडी दरवाजे पडलेले आहेत. इमारतीवर जायला मध्यभागी आणि उजव्या कडेने असे दोन भक्कम दगडी जिने बांधलेले असून इमारतीच्या बाह्यभिंतीवर विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. विजयनगरच्या सैन्याचे चित्रिकरण येथे केलेले आहे. गजदळ, अश्वदळ, उष्ट्रदळ, पायदळ आदि सैन्यदळांचे विविध प्रकार येथे शिल्पांकित केलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची शिल्पे आहेत ती उंटांची. उंटांची कोरीव शिल्पे फार कमी प्रमाणात दिसतात. महाराष्ट्रात तर मी भुलेश्वर वगळता उंटांचे शिल्प इतर कोठे पाहिल्याचे मला स्मरत नाही. येथे मात्र ती विपुल प्रमाणात आहेत. अगदी ह्याच इमारतीवर नव्हे तर विजयनगरच्या इतर भग्न इमारतींवर, मंदिरांवर देखील उष्ट्रशिल्पे बघायला मिळतात. इथल्या शिल्पपटांत प्रामुख्याने कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे चित्रण केलेले आहे.
महानवमी डिब्ब्याजवळील दोन प्रचंड दगडी दरवाजे
महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल
महानवमी डिब्ब्याच्या सर्वात खालच्या थरातील विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन
शिकारीचे दृश्य आणि त्याखालच्या पटात कोरलेले परकिय प्रवासी
महानवमी डिब्ब्याच्या विविध थरांचे नक्षीकाम आणि शिल्पकाम
शिकारीचे दृश्य
हे बहुधा विवाहाचे दृश्य असावे
महानवमी डिब्ब्याच्या सर्वात उच्च स्थानावरुन शाही केंद्राच्या आजच्या भग्नावस्थेचे दृश्य
महानव्मी डिब्ब्याच्या उजवीकडेच एक रचना लक्ष वेधून घेते ती आहे पायर्या पायर्यांची पुष्करिणी आणि पाणी खेळवण्यासाठी बांधलेले दगडी पाइप्स.
पुष्करिणी
शाही केंद्रातले हे एक अनोखे स्थापत्य आहे. पाच ते सहा विविध थरांनी बनलेली पायर्या पायर्यांची सुंदर रचना असलेली ही चौकोनी पुष्करिणी. पावसाळ्यात ही पूर्ण भरुन जाई. पण त्यानंतर तिचे पाणी आटल्यावर ती पुन्हा भरण्यासाठी विजयनगरच्या राजांनी लांबवर असलेल्या बंधार्यातून दगडी पाईप्सद्वारे येथे पाणी खेळवलेले होते. पुष्करिणीत पाणी आणण्यासाठी एक दगडी पाईप मुख्य रांगेला जोडला असून पाणी खेळवण्यासाठी एक दगड तिथल्या खाचेत बसवला जाई जेणेकरुन पाणी पुढे जायला अवरोध होऊन सर्व पाणी पुष्करिणीत जमा होई. हेच दगडी पाईप इतर ठिकाणी पाणी पुरवून पुन्हा भूमिगत होत व दुसर्या ठिकाणी परत बाहेर निघत. येथीलच हजारराम मंदिराच्या आवारात हे दगडी पाईप परत बाहेर निघालेले मी पाहिले आहेत.
पायर्या पायर्यांची पुष्करिणी
दगडी पाइप्समधून पुष्करिणीत पाणी खेळवण्यासाठी केलेली नळासारखी रचना
भूमिगत झालेले पाणी खेळवण्याचे दगडी पाईप्स
महानवमी डिब्ब्याच्या समोर आणि पुष्करीणीच्या दगडी पाइप्सच्या कडेकडेने पुढे जाताच अजून एक अनोखी रचना सामोरी येते ते म्हणजे भूमिगत खलबतखाना.
भूमिगत खलबतखाना
हा खलबतखाना जमिनीच्या आत खोदलेला असून आत जाण्यासाठी उंच उंच पायर्या
उतराव्या लागतात. आतमध्ये बोळकांडेसदृश रस्ता असून मध्यभागी खलबतखाना आहे.
त्याच्या बाजूने आतल्या अंधार्या बोळकांडातून गेल्यास अक्षरशः भुलभुलैयाचा
अनुभव येतो. आपण अंधारातून अचान्क कुठे बाहेर पडतो ते पटकन कळतच नाही.
विजयनगरच्या राजांची मंत्र्यांसोबत येथे गुप्त खलबतं चालत असंत असे मानले
जाते पण अनेकानेक उत्तमोत्तम इमारती असताना राजाला अशा अंधार्या, भूमिगत
आणि लहानश्या जागी खलबतं करायची गरजच काय हा प्रश्न मला येथे पडतो. ही
बहुधा खजिन्याची किंवा काही वस्तू ठेवायची जागा असावी असे मला वाटते.
गुप्त खलबतखाना
खलबतखान्यात जाण्यासाठी असलेले अंधारी प्रवेशमार्ग
ह्या खबतखान्याच्या शेजारीच आहे ते वीर हरिहराच्या राजवाड्याचे भग्नावशेष
वीर हरिहर राजवाडा
आजमितीस ह्या राजवाड्याचा फक्त चौथराच शिल्लक असून मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना हत्तींची जोडगोळी आहे. हा वीर हरिहर म्हणाजे हरिहर दुसरा. हा पहिल्या बुक्करायाचा मुलगा. ह्यानेच मदुराईच्या सुलतानाचा पराभव करुन मदुराईचे राज्य विजयनगरला जोडले.
वीर हरिहर राजवाड्याचे भग्नावशेष
ह्यानंतर समोर येते एक भव्य रचना ती आहे राजाचा जनता दरबार.
राजाचा जनता दरबार.
ही देखील इतर इमारतींप्रमाणेच एक भग्न झालेली इमारत आहे. नावाप्रमाणेच हा विजयनगरच्या राजांचा हा जनता दरबार. एका प्रचंड चौथर्यावर स्थित ही एक दुमजली इमारत असावी. राजाचे आसन दुसर्या मजल्यावर उंचभागी होते. ह्या दरबारात जनतेची गार्हाणी ऐकून विजयनगरचे राजे न्यायनिवाडा करत असत. महानवमी डिब्बा तसेच ह्या जनता दरबारातून शाही केंद्राच्या भग्नावशेषांचे उत्तम दर्शन होते. तेव्हाच्या समृद्धीची उत्तम कल्पना आजही येथे जाऊन करता येते. ह्या जनता दरबाराच्या बाहेरच एक प्रचंड आयताकृती दगडी डोणी असून ती बहुधा घोडेस्वारांना पाणी पिण्यासाठी असावी असे वाटते.
पाणी साठवण्याची आयताकृती दगडी डोणी
जनता दरबारातील राजाचे उच्चासन
जनता दरबारातून दिसणारे भग्नावशेष
जनता दरबारातून दिसणारा भग्न तट आणि महानवमी डिब्बा
जनतादरबारातून दिसणारे हजारराम मंदिर
राजवाडा केंद्रातील काही भग्नावशेष
--
ह्या व्यतिरिक्तही इकडे काही महत्वाच्या इमारती आहेत उदा. सरदारांची घरं, सैनिकांच्या बराकी, धान्याची बळदं, नाण्यांची टांकसाळ पण वेळेअभावी इकडे जायला जमले नाही. आता पुढचे आकर्षण होते ते इथले सुप्रसिद्ध असे हजारराम मंदिर. हे इथलं एक प्रमुख आकर्षण,. रामायणातील सर्व प्रसंगांची हजारावर शिल्पं असणारं एक देखणं मंदिर. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार
हजारराम मंदिर
हजारराम मंदिर, विजयनगरच्या ऐन शाही परिसरातील हे मंदिर, साहजिकच हे बांधले गेले ते सम्राटांचे खाजगी मंदिर म्हणूनच. विजयनगरच्या संगम राजघराणातल्या देवराय दुसरा ह्याने हे मंदिर बांधले ते लहान स्वरूपात. तेव्हा मंदिर फक्त सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह इतकेच मर्यादित होते. नंतरच्या सम्राटांनी अधिकची भर घालून आजचे शिल्पसमृद्ध मंदिर आकारास आणले. हा देवराय दुसरा (१४२४ ते १४४६) हा संगम घराण्यातला एक सर्वश्रेष्ठ राजा. इराणवरुन आलेल्या अब्दुर रझाक ह्या प्रवाशाने ह्या देवरायाचे साम्राज्य गुलबर्गा ते श्रीलंका आणि ओरिसा ते मलबार इतके विस्तारित होते असे वर्णिले आहे. तर समकालीन युरोपियन प्रवासी निकोलो कोंतीच्या म्हणण्यानुसार ह्या देवरायाने श्रीलंका, ब्रह्मदेश, केरळ आणि तामिळनाडूतून खंडणी गोळा केली होती.
हंपीच्या भग्न अवशेषांत हजारराम मंदिर शोधणे तसे सोपे आहे. शाही परिसरातून अंतःपुरात जाणारा रस्ता हा हजारराम मंदिरावरुनच जातो. शाही परिसरातूनही हे मंदिर दूरवरुनही नजरेच्या टप्प्यात सतत येत असते. शाही परिसरात हिरवळ दिसते ती हजारराम मंदिर परिसरातच. हजारराम मंदिर तटबंद असून मंदिराच्या तटाच्या बाह्यभिंतींना विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन केलेले असून आतील बाजूच्या भिंतींवर आणि मंदिराच्या बाह्यांगावरही रामायणातील प्रसंगांचे अंकन केलेले दिसते. हजारराम मंदिराचे स्थापत्य द्राविड पद्धतीचे असून सभामंडप (मुखमंडप), अंतराळ आणि गर्भगृह असून डाव्या व उजव्या बाजूस अर्धमंडप आहेत. मंदिराच्या डाव्या मागील बाजूस महामंडप असून (असे मुख्य मंदिरापासून बाजूस असलेले मंडप हंपीच्या बहुतेक सर्वच प्रमुख मंदिरात दिसतात) उजव्या बाजूस सालंकृत देवी मंदिर आहे. इथल्या मुखमंडपातील स्तंभ मात्र वालुकाश्मांचे नसून काळे कुळकुळीत दगडांचे (बहुधा ग्रॅनाइट) आहेत.
हजारराम मंदिराचे प्रवेशद्वार
मंदिरतटाच्या बाह्य भिंतीवर असलेले विजयनगरच्या सैन्याच्या शिल्पांकन
मंदिराच्या प्रवेशद्वारात एका बाजूला महिषासुरमर्दिनी तर दुसर्या बाजूस भैरव आहेत.
महिषासुरमर्दिनी व भैरव
-
मंदिराच्या आवारात पूर्वी एक स्तंभ होता असे दिसते पण सध्या केवळ स्तंभपीठ अस्तित्वात असलेले दिसते. प्रवेशद्वारातून आत येताच रामायणातील शिल्पांचा एक विस्तृत पटच नजरेसमोर उभा राहतो. पाच शाह्यांकडून जवळपास ६ महिने विजयनगर लुटलं जात असूनही इथलं अगदी थोडकी त्यातही मंदिराच्या मुखमंडपाच्या शिखरभागाची शिल्प सोडून इतर शिल्प भग्न नाहीत. ह्याचं कारण मात्र त्या शाह्यांच्या सरदारांमध्ये हिंदू सरदारही बरेच असावेत असे अनुमान काढता येते. अर्थात ही शिल्प जरी भग्न केलेली नसली तरी त्याचं उट्टं गर्भगृहातील मूर्ती भग्न करुन काढलेलं दिसतं कारण येथील बहुतांश प्रमुख मंदिरात गाभार्याती मूर्ती दिसत नाहीत. त्या एकतर भग्न केलेल्या असाव्यात किंवा किंवा गर्भगृहात गाय वगैरे मारुन मंदिर वाटवलं असावं त्यामुळे गावकर्यांनी मुख्य मूर्ती इतरत्र सुरक्षित ठिकाणी लपवल्या असाव्यात किंवा स्थापित केल्या असाव्यात. ह्याच कारणांमुळे प्रमुख विरुपाक्ष मंदिर आणि उड्डाण वीरभद्रासारखी काही लहान मंदिरे सोडली तर इकडील मंदिरात कुठेच नित्यपूजा होत नाही.
मुखमंडपाच्या शिरोभागावरची भग्न शिल्पे
मंदिराचे मुखदर्शन
मंदिररचना
रामंदिर व देवीमंदिर
मंदिरावरील शिलालेख व बांगड्यांची नक्षी
राममंदिर व देवीमंदिर मागील बाजूने
राममंदिर
चला आता मंदिराच्या बाह्य भिंतीवरील रामायणातील काही प्रसंग पाहूयात.
दशरथाकडून श्रावणाचा वध.
सर्वात खालच्या पट्टीकेत दिसतोय तो श्रावणबाळ आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला चालला आहे. वाटेत त्यांना तहान लागली म्हणून तो तिथेच एका तलावावर पाणी भरण्यासाठी जात आहे , त्याच्या तांब्याच्या गुडगुडण्याने आवाज होऊन मृगयेसाठी आलेल्या दशरथाला कुणी जनावर पाण्यावर आलंय असा भास होऊन तो शब्दवेधाने बाण मारत आहे. तो बाण श्रावणाच्या वर्मी लागून तो मृत्युपंथाला लागलेला असून दशरथ अपराधी भावनेने त्याच्याकडे येत आहे. ह्याच्याच बाजूच्या शिल्पपट्टीकेत श्रावणाच्या वृद्ध आईबापांनी दशरथाला शाप दिल्याचे शिल्पांकन आहे.
श्रावणवध
पायसदान
राजा दशरथाने ऋषी ऋष्यश्रृंगांच्या साहाय्याने पुत्रक्कामनेपोटी पुत्रेष्टी यज्ञाचे अनुष्ठान केले. यज्ञातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले आणि त्याने दशरथाला सुवर्णामयी भांड्यात पायस देउन ते राण्यांना अर्पण करण्यास सांगितले. खीरीचे सेवन करुन तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. कौसल्येपोटी राम, सुमित्रेपोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकयीपोटी भरत जन्माला आला. पुत्र थोडे मोठे होताच ऋषि विश्वामित्र राक्षसवधांसाठी राम लक्ष्मणाची मागणी करण्यास दशरथाकडे आले.
ह्या छायाचित्रात डावीकडे यज्ञपुरुष (अग्नी) दशरथाला पायसदान करताना. येथे अग्नीची वृषभमुखी शिल्प कोरलेले आहे हे विषेश. ऋग्वेदात अग्नीला वृषभ म्हणलेले आहे (अग्नीवृष). मधल्या पटात दशरथ तिन्ही राण्यांना खीर देताना व सर्वात डावीकडे विश्वामित्र दाशरथींची मागणी करताना.
अगदी हाच प्रसंग मंदिराच्या तटाच्या आतील बाजूस देखील कोरलेला आढळतो. अर्थात हे शिल्पांकन विजयनगरच्या देवरायानंतरच्या राजांच्या काळात झालेले आहे हे आधी सांगिलेलेच आहे.
अहिल्योद्धार आणि राक्षसवध
मारीच आणि सुबाहू हे राक्षस विश्वामित्राच्या यज्ञात सतत विघ्न आणत असल्याने विश्वामित्राने दशरथाकडून त्याचे दोन पुत्र राम लक्षण राक्षसवधासाठी मागून घेतले आहेत. विश्वामित्र आश्रमाच्या वाटेवर असताना वाटेत गौतमाच्या शापाने शिळा झालेल्या अहल्येचा रामाच्या स्पर्शाने उद्धार होतो व त्या शिळेवाटे अहल्या आपल्या मूळच्या स्त्रीरुपात प्रकट होते.
राम लक्ष्मणांकडून सुबाहू आणि इतर राक्षसांचा वध होताना. मारीच मात्र जखमी होऊन लंकेला पळून जातो.
सीतास्वयंवर.
राक्षसवधानंतर विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत येतात. तिथे विश्वामित्राच्या आज्ञेने सीतास्वयंवरासाठी शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावणे हा पण पूर्ण करण्यासाठी राम धनुष्य उचलून प्रत्यंचा लावण्यास जाताच धनुर्भंग होतो. सीता रामाचा पती म्हणून स्वीकार करते.
बालकाण्डातील हा संपूर्ण प्रसंग असलेला शिल्पपट
कैकयी प्रसंग
चारही भावांचे विवाह होऊन श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी अयोध्येत सुरु होते त्याच वेळी मंथरा कैकयीचे कान भरते आणि भरतासाठी राज्यपद व रामाला वनवास हे दोन वर दशरथाकडे मागण्यास प्रवृत्त करते.
कैकयी आणि मंथरा ---------------------------------------------------------------------------------------------------------कैकयी आणि दशरथ
-
सीताहरण
शूर्पणखेचे नाक कान लक्ष्मणाने छाटल्यावर ती खर दूषण आदी राक्षसांना राम
लक्ष्मणांना खाऊन टाकण्यास सांगते. खर-दूषणासहित १४ सहस्त्र राक्षसांचा
राम लक्ष्मण संहार करतात त्यामुळे शूर्पणखा रडत रडत लंकेत रावणाकडे जाऊन
रामाला मारण्यास सांगते, रावण बधत नाही हे पाहून ती शेवटी सीतेच्या अप्रतिम
सौंदर्याचे वर्णन करुन रावणाच्या मनात सीतेविषयी अभिलाषा उत्पन्न करते.
लंपट रावण मारीचाला मायावी रूपाने रामास सीतेपासून दूर नेण्यास सांगतो व
एकाकी सीतेला पळविण्यास प्रवृत्त होतो.
मायावी कांचनमृगाला पाहून सीता त्याजवर आकर्षित होते व हट्टाने रामास त्या
मृगास धरुन आणण्यास फर्मावते. मायावी सुवर्णमृग रामाच्या बाणाने घायाळ होऊन
"धाव लक्ष्मणा" असा आर्त टाहो फोडून सीतेचे हृदय विकल करतो. व्याकुळ सीता
तिच्या संरक्षणासाठी थांबलेल्या लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास
सांगते. सीतेची आज्ञा प्रमाण मानून त्याच वेळेस रावण एका साधूचे रूप घेऊन
सीतेच्या कुटीसमोर येतो व भिक्षेच्या मिशाने तिचे हरण करतो. सीतेला पळवून
नेत असतानाचा जटायु सीतेला वाचवण्यासाठी रावणावर झडप घालतो व रावण आपल्या
खड्गाने जटायुचा वध करतो.
सुवर्णमृगाला पाहून सीतेचे आकर्षित होणे व रामाच्या समजावण्यारही तिने हट्टाने रामाला त्याला धरुन आणण्यास पाठवणे.
सुवर्णमृगाचा वध व राम लक्ष्मणांची भेट
रावण साधूवेषाने येऊन सीतेचे हरण करतो
जटायुवध
वालीवध
सीताहरणानंतर शोकाकुल अव्स्थेतील राम लक्ष्मण ऋष्यमूक पर्वताजवळ येतात. त्या शस्त्रधारी वीरांना पाहून भयभीत झालेला सुग्रीव हनुमानास श्रीरामांची भेट घेण्यास पाठवतो. सुग्रीव आणि श्रीराम ह्यांमध्ये मैत्र उत्पन्न होऊन सुग्रीवाची पत्नी रुमाला बळकावून आणि त्याला राज्याबाहेर हाकलून किष्किंधेत असलेल्या वालीला मारण्याची ऋष्यमूक पर्वतावरील वानरराज सुग्रीव श्रीरामाला विनंती करतो व सीतेचा शोध घेण्याच्या कामी मदत करण्याचे आश्वासन देतो. त्याच वेळी वालीच्या सामर्थ्याला भिऊन असलेला सुग्रीव रामाच्या बलाची परीक्षा घेतो. ती परीक्षा म्हणजे मातंग पर्वतावरील महाप्रचंड दुंदुभी दैत्याचा सांगाडा दूर फेकणे व त्यानंतर एकाच वेळी सात साल वृक्षांमधून तीर मारणे. रामाने हा पराक्रम अगदी सहजी केल्याचे पाहून सुग्रीव वालीवधाविषयी निश्चिंत होऊन किष्किंधेत जाउन त्याला ललकारतो. त्यांचे द्वंद्वयुद्ध चालू असतानाच राम वृक्षाआडून बाण मारुन वालीवध करतो व मरणोन्मुख वालीला उपदेश करतो.
श्रीराम लक्ष्मणांची हनुमान भेट. (इथे अर्धचंद्र बाणाची प्रतिमा उल्लेखनीय आहे)
रामाची सुग्रीवाकडून परिक्षा (उजवीकडे), मध्यभागी मरणोन्मुख वालीला उपदेश करताना राम, शेजारी रडत असलेली वालीपत्नी तारा व कुमार अंगद
अशोकवन प्रसंग व सेतूबंधन
सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान दक्षिण समुद्र उल्लंघून लंकेत येतो. तेथे अशोकवाटिकेत सीतेची भेट घेतो व लवकरच श्रीराम सैन्यासह येऊन तुझी सुटका करतील असे बोलून सीतेस आश्वस्त करतो. आपली ओळख पटवैण्यासाठी सीता आपला चूडामणी हनुमानास देते, तदनंतर अशोकवनाचा विध्वंस करुन हनुमान किष्किंधेस परत येतो.
सीता आपला चूडामणी हनुमानास देताना
सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले श्रीराम वानरसैन्यासह समुद्रावर दगडांचा सेतू बांधून लंकेवर चालून जातात.
सेतूबंधन
युद्धकाण्ड
वानरसैन्याचे रावणाच्या राक्षससेनेबरोबर तुंबळ युद्ध होते. १० दिवस युद्ध चालून देवांतक, नरांतक, अतिकाय, प्रहस्त, कुंभकर्ण, इंद्रजित असे महान रावणसेनाधिपती एकेक करुन मारले जातात व दहाव्या दिवशी रामाच्या हस्ते रावणवध होतो.
युद्धातील काही प्रसंग
युद्धातील काही प्रसंग
युद्धातील काही प्रसंग
रावणवध
देवीमंदिरात लवकुशांची शिल्पे देखील आहेत असं समजलं होतं पण दुर्दैवाने त्याचा गाभारा बंद असल्याने ती काही पाहता आली नाहीत.
शिल्पपटांची रचना
शिल्पपटांची रचना
शिल्पपटांची रचना
येथे रामायणातील शिल्पे जरी सर्वाधिक असली तरी काही मोजकी शिल्पे कृष्णाची देखील आहेत.
विविध शिल्पे
बाळकृष्ण, विष्णू, हनुमान अशी शिल्पे
अष्टभुज श्रीकृष्ण
ही सर्व शिल्पे बाह्य बाजूने बघत बघत आम्ही मंदिराच्या सभामंडपात गेलो. सभामंडपतले काळे कुळकुळीत स्तंभ उल्लेखनीय आहेत. स्तंभावर विष्णूचे अवतार, कृष्ण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत.
सभामंडप
स्तंभावरील विष्णूचा भविष्यातील १० वा अवतार कल्कीची प्रतिमा. हाती ढाल, तलवार, शंख, चक्र धारण करुन कल्की घोड्यावर आरुढ आहे.
कृष्ण आणि विष्णू
-
गाभारा कुलूपबंद असल्याने आत जाता आले नाही पण आतमध्ये एक पीठासन असून त्याजवर तीन खड्डे आहेत अशी माहिती समजली त्यावरुन येथे पूर्वी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या प्रतिमा होत्या हे सहज समजते.
देवीमंदिर
मंडप
विजयनगरच्या मंदिरातील उल्लेखनीय प्रकार म्हणजे मंदिराच्या बाजूस असलेले मंडप. ते येथेही आहेत. मंडपात राजाची प्रजेबरोबर भेट, देवाच्या नैवेद्यासाठी पाकसिद्धी, यात्रेकरुंच्या विश्रामासाठी व्यवस्था अशा विविध सोयी केलेल्या असत. बहुतेक मंडपांना कल्याणमंडप असे संबोधले जाते.
कल्याणमंडप
मंडप
हजारराम मंदिरात देखील दगडी पाईपांद्वारे पाणी खेळवले होते, पाणी साठवण्यासाठी येथे एक लहानशीच परंतु १०/१२ पुरुष खोल विहिर खणण्यात आली होती जी आजही येथे अस्तित्वात आहे.
ही ह्या मंदिरावरील काही मोजकी शिल्पे. रामायणातील इतरही शेकडो शिल्पे येथील भिंतींवर आहेत पण विस्तारभयास्तव सर्वांचे वर्णन तसेच छायाचित्रे येथे देता येणे शक्यच नाही.
हजारराम मंदिर बघून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या समोरच एक ध्वजस्तंभ आहे. ते ठिकाण म्हणाजे पान सुपारी बाजार.
पान सुपारी बाजार.
पान सुपारी बाजार हे हंपीतील प्रमुख बाजारांपैकी एक. इतर प्रमुख बाजार म्हणजे विरुपाक्ष मंदिरासमोरील हंपी बाझार, कृष्णपुर्यातील कृष्ण बाजार, विठ्ठलपुर्यातील विठ्ठल बाजार आणि अच्युतराय मंदिरासमोरील सुले बाजार. पानसुपारी बाजाराचा उल्लेख देवरायाच्या एका शिलालेखात आढळतो. आज येथे फक्त भग्न अवशेष आहेत. पान सुपाॠ बाजार ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे येथे एक उंच ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या बाजूलाच पूर्वीच्या बाजारपेठेचे अवशेष आहेत.
ह्या बाजारपेठेला पान सुपारी बाजार नाव पडण्याचे कारण बहुधा येथे पूर्वी सुपारीची भरपूर झाडे होती हे असावे. विजयनगरला भेट देणार्या परकीय प्रवाशांनी येथील रहिवाश्यांचे पान खाण्याचे वर्णन केले आहे. त्यात येथील लोक एक प्रकारचे पान खाउन स्वत:ची तोंडे लाल करुन घेतात असे लिहिलेले आहे. आजही येथे सुपारीची झाडे आहेत.
पान सुपारी बाजारातील ध्वजस्तंभ
पान सुपारी बाजाराचे अवशेष
पान सुपारी बाजाराचे अवशेष
इतकं सगळ बघून होईता दुपारचे जवळपास अडीच तीन वाजले होते. आता जेवण करुन जायचे होते ते हंपीपासूनच जवळच असलेले एक अनोखे आकर्षण बघायला. ते म्हणजे भारतातील एकमेव असलेले अस्वल अभयारण्य. अर्थात दरोजी स्लॉथ बेयर पार्क. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशःदारोजी अस्वल अभयारण्य
दारोजी अस्वल अभयारण्य हे हंपीच्या अगदी जवळ म्हणजे सुमारे १५ किलोमीटर अंतरावरच आहे. हे भारतातलं पहिलं अस्वल अभयारण्य. ह्याची स्थापना १९९४ साली झाली. इथला जंगलभाग आपल्या नेहमीच्या दाट जंगलांसारखा नाही. तो बहुतांशी खुरड्या, काटेरी झुडुपांचा आहे. किंबहुना इथले खडकाळ जमिनीवर झाडी उगवणेही तसे अशक्य. तथापी आज इथे ही जी वनसंपदा दिसतेय ती वनखात्याच्या अथक परिश्रमाने, कारण ही इथली झाडी नैसर्गिक नाहीत, अथक वनीकरण करुन आजची इथली समृद्ध हिरवी वनसंपदा निर्माण केली गेली आहे. इथल्या टेकड्यांवरील प्रचंड मोठ्या दगडांत असलेल्या कपारींत अस्वलांना लपायला मुबलक जागा आहे. जवळपास दोनशे अस्वले येथल्या परिसरांत आहे असे सांगण्यात येते. ह्या अस्वल अभयारण्याला काहीसा पौराणिक आधार देखील आहे. किंष्किंधा नगरीपासून (हंपी) जवळ असलेले ऋक्षराज जांबवंतांचे राज्य येथलेच असे येथे मानले जाते. अस्वलांशिवाय येथे मोर, माकडे,बिबटे, कोल्हे, मुंगूस, रानडुकरे आदी प्राणी सुद्धा येथे आढळतात. मोर आणि रानडुकरे तर येथे विपुल प्रमाणात आहेत.
आम्ही हंपीहून येथे येण्यासाठी दुपारी साडेतीनला निघालो ते जेमतेम अर्ध्या तासात दारोजी अस्वल अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचलो. दारोजी अभयारण्यात यायचे असेल तर दुपारीच यावे लागते कारण हे अभयारण्य सकाळी खुले नसते. ह्याची वेळ आहे दुपारी २ ते संध्याकाळी ६. स्वतःचे वाहन असेल तर येथे येणे अत्यंत सोयीचे आहे. ते जर नसेल तर हंपीहून भाड्याने कार किंवा रिक्षासारखी वाहतुकीची साधने मिळू शकतात पण ते खूप महाग जाते. अर्थात हंपीहून येथे भाड्याने बाईक घेउन येणे स्वस्त पडते. अभयारण्यात प्रवेश फी ही एका चारचाकी वाहनाला ५०० रु. आणि प्रती माणशी ५० रु. अशी आहे जी अर्थातच खूप जास्त वाटते. येथे तिकिट घेऊन आणि वनखात्याच्या नोंदवहीत नोंद करुनच आपल्याला पुढे जाता येते.
अभयारण्यातील रस्ता हा कच्चा आहे. ह्या रस्त्याने जातांना असंख्य मोर आपल्या दृष्टीस सतत पडत असतात. मात्र अस्वलांच्या मुख्य प्रदेशाच्या गाभ्यात जायचे रस्ते हे विविध प्रवेशद्वारे तसेच कुंपणे लावून प्रवेश प्रतिबंधित केलेला आहे. सर्वसामान्यांना अस्वलांचे निरिक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारापासून सुमारे ४ किलोमीटर वनखात्याने एका टेकडीवर एक निरीक्षण मनोरा बांधलेला आहे. टेकडीवर जाणार्या सुमारे सत्तर पायर्या चढून आणि प्रचंड मोठ्या खडकांमधून वाट काढतच आपला प्रवेश निरिक्षण मनोर्यावर होतो. मनोर्याच्या समोरच सुमारे २००/३०० मीटर असणार्या टेकड्यांवरील खडकांच्या कपारींत अस्वलांचे वास्तव्य आहे. ही अस्वले जर बघायची असतील तर आपल्याजवळ उत्तम दर्जाची दुर्बिण किंवा टेलीफोटो लेन्स असलेला कॅमेरा असणे अत्यावश्यक आहे. ही साधने जर आपल्याजवळ नसतील तर येथे येऊच नये असे मी म्हणेन कारण येथून जी अस्वले किंवा इतर प्राणी दिसतात ते अक्षरशः एखाद्या ठिपक्यासारखे दिसत असतात. इथल्या विस्तृत परिसरातील राखाडी, तांबड्या हिरव्या रंगाच्या नैसर्गिक कॅमोफ्लाजमुळे प्राणी दुरुन पटकन ओळखणे सुद्धा अवघड होते.
निरिक्षण मनोर्याकडे जाणारा रस्ता
मनोर्यावरुन दिसणार्या खडकाळ टेकड्या (ह्याच कपारींमध्ये अस्वलांचे वास्तव्य आहे)
अर्थात अस्वले जरी येथून लांबवर दिसत असली तरीही येथे अस्वले दिसण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कारण वनखात्याचे लोक दुपारी येउन येथील कपारींनजीकच्या खडकांवर गूळ, मधाचे मिश्रण पसरवून जातात. दुपारी चारच्या सुमारास हे मिश्रण खाण्याच्या मिषाने अस्वले हमखास बाहेर पडतात व त्यांचे दर्शन आपणांस होते. मला व्यक्तिशः हे असे मिश्रण खाण्यास देणे आवडले नाही कारण त्याने प्राणी परावलंबी होऊन स्वतःचे अन्न स्वत: मिळवण्याच्या दृष्टीने अक्षम होतात. अर्थात इथल्या ओसाड, रूक्ष भागामुळे प्राण्यांना नैसर्गिक अन्न मिळवणे तसेही अवघडच आहे.
मनोर्यावरुन चहुबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. इथल्या भव्य प्रस्तरांत, खुरट्या झाडीत एक वेगळेच सौंदर्य आहे. मधूनच एखादा तांबट पक्षी कुटुर्र कुर्र अशी साद घालत होता. तर कुण्या जोडीचे प्रणयाराधन चालले होते.
तर वेडा राघू झाडाच्या फांदीवर ध्यानस्थ बसून भक्ष्य टिपण्याची वाट बघत होता.
हे पक्षी दिसत असतानाच समोरील कपारीमधून अस्वल चालत आले. ही भारतीय काळी अस्वले संथ असतात, गूळ, मध, फुले, किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य. सहसा शांत असलेली ही अस्वले ही प्रसंगी खूप हिंसक होतात. त्यामुळे ह्यांच्या जवळ न जाणेच हिताचे.
कपारीतून बाहेर आलेले अस्वल
तुम्ही जर नशिबवान असाल तर तुम्हाला येथे एक अविस्मरणीय दृश्य दिसू शकते ते म्हणजे पिल्लांसहित असलेल्या अस्वलमादीचे. आमचे नशिब जोरावर असल्याने आम्हाला दोन पिल्लांसह बाहेर आलेल्या मादीचे दृश्य पाहावयास मिळाले. पिल्लांसह असलेली अस्वलमादीचे दृश्य बघणे हे वर्णनातीत असते कारण मादी आपल्या पिल्लांना पाठुंगळी घेऊन हिंडत असते. मध्येच पिल्लांचे तिच्या पाठीवरुन उतरणे, परत तिच्या पाठीवर बसण्याची चढाओढ बघायला फार मजा येते.
दोन पिल्लांसह असलेली अस्वल मादा
आईच्या पाठीवर बसण्यासाठी होणारी चढाओढ
अस्वलबाळांच्या लीला पाहात असतानाच एक भला थोरला रानडुक्कर नजरेस पडला. इतका भलाप्रचंड डुक्कर मी आयुष्यात ह्याआधी कधी पाहिला नव्हता. दूर अंतरावरुनही तो अगदी सुस्पस्टपणे दिसत होता.
रानडुकराच्या आजूबाजूने मोर सुखैनैव चरत होते.
थोड्यावेळाने डोंगरकडा उतरुन रानडुक्कर थेट रस्त्याजवळ आला आणि तिथल्या दगडांवर आपले सुळे घासू लागला
सुळ्यांना धार करुन झाल्यावर तिथल्या दगडांवर फासलेले गूळ मधाचे मिश्रण खाऊ लागला
इतक्यात भर उन्हाळ्यातही एक मोर पिसारा फुलवून नाचू लागला
इकडे लांबवर अस्वले दिसतच होती.
मध्येच एखादा मोर डौलदारपणे फिरत होता.
हे सर्व बघता बघताच सूर्य मावळू लागला व आम्ही निघायची तयारी सुरु लागलो. मगाशी वर सांगताना एक महत्वाची गोष्ट विसरलो. येथे येताना पाण्याची बाटली आणणे आवश्यक आहे कारण संपूर्ण अभयारण्यात पिण्याच्या पाण्याची सोय कुठेही नाही.
इथल्या समृद्ध वनप्रदेशाचे अल्पसे दर्शन घेऊन आम्ही साधारण सहा साडेसहाला येथून निघालो ते साडेसातपर्यंत कमलापूरला आलो. हॉटेलवर जरा फ्रेश होऊन आम्ही निघालो ते इथल्या सुप्रसिद्ध अशा विरुपाक्ष मंदिरात जायला. हंपीचा इतर सर्व परिसर गडद काळ्या अंधारात बुडून जात असताना इथले चैतन्य रात्रीही सुरु असते ते आजही एका प्रमुख देवस्थानांमध्ये गणल्या जाणार्या विरुपाक्ष मंदिरात. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी
विरुपाक्ष मंदिर परिसर
दारोजी अस्वल अभयारण्यात जाऊन आम्ही परत कमलापूरच्या केटीडीसीला परत
आलो, थोडा वेळ आराम करुन परत हंपीच्या विरुपाक्ष मंदिरास जाण्यास निघालो.
दिवसा उजाड, वैराण असणारा हंपीचा परिसर रात्री निबीड अंधारात बुडून जातो,
कमलापूर हंपी रस्त्यावर असलेले प्रचंड प्रस्तर रात्रीच्या आंधारात विलक्षण
गूढ वाटू लागतात. वाटेत लागणार्या उड्डाण वीरभद्र मंदिरात मात्र काहीतरी
जाग दिसत असते. हंपीतील आजही पुजल्या जाणार्या अत्यल्प मंदिरांपैकी उड्डाण
वीरभद्र मंदिर हे एक. उड्डाण वीरभद्र मंदिर ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे
मंदिर संपूर्ण पांढर्या रंगात रंगवलेले आहे शिवाय मंदिराच्या पुढ्यात एक
दीपस्तंभ आहे. शिवाय येथे पूजा सुरु असल्याने आसमंतात प्रार्थनेचे सुर घुमत
असतात. ह्या मंदिराच्या समोरच आहे ते चंडिकेश्वर मंदिर. चंडिकेश्वर
मंदिरही अप्रतिम शिल्पकलेने नटलेले आहे. वेळेअभावी आम्हाला ह्या दोन्ही
मंदिरांत जाता आले नाही. ह्या मंदिरांच्या नंतर रात्री आकाश उजळलेले असते
ते थेट विरुपाक्ष मंदिर परिसरात. आजचे हंपी गावही ह्या मंदिराच्या बाजूलाच
पसरलेले आहे. विरुपाक्ष मंदिर हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक,
ह्यामुळे देशातील विविध प्रांतातील यात्रेकरुंची येथे सतत ये जा असते.
विरुपाक्ष मंदिराच्या मुख्य गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच
यात्रेकरुंची गर्दी झालेली तेथे आढळून येते. मुक्कामाचे यात्रेकरु
मंदिराच्या प्रांगणात, शतस्तंभी मंडपात आपली पथारी टाकून झोपायच्या तयारीत
असतात, तर काहींची शतस्तंभी मंडपाच्या बाजूलाच असलेल्या भोजनशाळेत
त्यांच्या स्वयंपाकाची तयारी चालू असते. अर्थात हे विरुपाक्ष मंदिरातील
रात्रीचे दृश्य. मंदिर जर अतिशय निवांतपणे पाहायचे असेल तर ते रात्रीच
पाहावे कारण यात्रेकरुंची गर्दी रात्री तुलनेने कमी असते आणि जी असते ती
मुख्य गोपुर आणि रायगोपुर ह्यांच्या मधील प्रांगणात. अर्थात रात्री मंदिर
पाहण्याचा एक तोटा म्हणजे रंगमंडप आणि कल्याणमंडपातील शिल्पं पुरेशा
प्रकाशाअभावी बारकाईने पाहता येत नाहीत.
साधारण रात्री साडेसाठच्या आसपास आम्ही विरुपाक्ष मंदिरात पोहोचलो,
यात्रेकरुंची थोडीशी गर्दी ओलांडून आतल्या गोपुरातून रंगमंडपात आणि
गर्भगृहात गेलो, मंदिराचे पुजारी खूप सहकार्य करणारे दिसले. गर्भगृह सोडून
मंदिराच्या अंतराळातील शिल्पांची छायाचित्रे त्यांच्या परवानगीने विनासायास
काढता आली. विरुपाक्ष मंदिर संकुलातील मुख्य मंदिराच्या बाजूलाच पंपा आणि
भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे जे चालुक्य कालीन आहे. त्यांचे स्तंभ,
मंदिरातील शिल्पे ह्यावरुन त्यांचा काल सहजीच लक्षात येतो. रात्री गेल्यास
हे सर्व मंदिर संकुल अगदी निवांतपणे बघता येते. विरुपाक्ष मंदिर पाहून
बाहेर आलो आणि मंदिराच्या उजव्या बाजूस असणार्या हंपी गावात शिरलो.
हंपी गाव म्हणजे तीनचार समांतर गल्ल्या असणारं लहानसं गाव. विरुपाक्ष
मंदिराच्या दोन्ही बाजूला हंपी गाव पसरलेले आहे. डाव्या बाजूस थोडेसे
घरगुती निवास आहेत. शेजारीच बस स्टॅण्ड आणि किरकोळ दुकाने आहेत तर मुख्य
गाव हे मंदिराच्या उजवीकडील बाजूस आहे. येथेही पर्यटकांसाठी घरगुती निवास
आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही किंवा जे बॅकपॅकर्स म्हणून आलेत
त्यांच्यासाठी राहण्यासाठी हे निवास उत्तम आहेत. हंपीच्या ऐन गाभ्यात
स्वस्त आणि साधी राहण्याची सोय. इथल्याच एका उपाहारगृहात आम्ही जेवायला
गेलो ते म्हणजे मॅन्गो ट्री रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट तिथले प्रसिद्ध.
जेवायला बसण्याची इथली पद्धत वेगळी, गाद्या वगैरे घातल्या आहेत त्यावर
मांडी घालून बसायचे नाहीतर निवांत पसरायचं, पुढ्यात ओटे आहेत. त्यावर ताट
ठेवून निवांत जेवायचं. इथे आणि हंपीमधील इतरही काही रेस्टॉरन्ट्स मध्ये
इस्रायली आणि लेबानीज खाद्यपदार्थ मिळतात तेही माफक दरांत. इथे जेवून
अंधारात बुडालेल्या रात्रीच्या हम्पीच्या अवशेषांतून जाणार्या रस्त्याने
परत कमलापूरला आलो. हंपीतील पहिला दिवस संपला होता आता दुसर्या दिवशी
सकाळी परत विरुपाक्ष मंदिरातच यायचे होते.
विरुपाक्ष मंदिराचे गोपुर
हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर
सकाळी लवकरच आवरुन परत विरुपाक्ष मंदिरात आलो. सातव्या शतकातलं हे
मंदिर. चालुक्यांनी बांधलेलं. त्या काळापासून हे मंदिर एक प्रमुख धर्मस्थळ
आहे जे आजही कार्यरत आहे. त्याकाळी हे मंदिर लहानसे होते मात्र
चालुक्यांनंतर होयसळांनीही मंदिराच्या कामात भर घातली व विजयनगरच्या
राजवटीत विरुपाक्ष मंदिराला आजचे भव्यदिव्य स्वरुप प्राप्त झाले.
विजयनगरचे हे गोपुर अतिशय भव्य. ९ मजली, ते ही दुमजली अशा दगडी अधिष्ठानावर
आधारलेले. वरच्या ९ मजल्यांच्या बांधकामात विटांचे बांधकाम आहे व त्यावर
द्राविडी पद्धतीचा कळस आहे. गोपुराच्या प्रत्येक थरांवर देवदैवतांची
शिल्पे, सुरसुंदरी आणि मैथुनशिल्पे देखील आहेत. आजच्या हंपीतील सर्वात
प्रमुख वास्तुशिल्प असेल ते हे गोपुर. हे इतके उंच आहे की ते हंपी गावातून
कुठूनही नजरेत भरते. ह्या गोपुराचा जीर्णोद्धार विजयनगरच्या सर्वात
प्रसिद्ध सम्राटाने कृष्णदेवरायाने केला. रायाच्या कारकिर्दित विजयनगरची
स्थापत्यकला कळसास पोहोचलेली होती.
विरुपाक्ष मंदिराचे गोपुर
गोपुरावरील विष्णू, मुरलीधर, शिव, गणेश आदी देवताशिल्पे
गोपुरावरील भैरव आणि त्याच्या उजवे बाजूकडील एक मैथुनशिल्प
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच गोपुराच्या खालच्या दगडी थरांतही काही शिल्पपट आहेत. त्यातील एक म्हणजे मार्कंडेयनुग्रह शिवमूर्ती किंवा कालारी शिव. मार्कंडेयाचे अल्पायुष्य संपल्याने त्याला नेण्यास आलेल्या यमाचे म्हणजेच साक्षात कालाचे पारिपत्य शिव करतो त्याची ही कथा
कालारी शिव
गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत येत्याच डाव्या बाजूच्या सज्जात भैरवाची एक मूर्ती आहे. द्वारातून आपला प्रवेश एका भव्य प्रांगणात होतो. उजव्या बाजूच्या भिंतीत १४ हात असलेली एक देवी, मयुरारूढ कार्तिकेय आणि विजयनगरचे राजचिन्ह कोरलेल्या तीन विविध शिळा बसवलेल्या आहेत.
विजयनगरचे राजचिन्ह चालुक्यांच्या राजचिन्हात किरकोळ बदल करुन घडवलेले दिसते. वराह, चंद्र, सूर्य आणि सरळ पात्याचा खंजीर. विजयनगरचे राजे हे वैष्णव असल्याने त्यांच्या राजचिन्हावर वराह असणे साहजिकच आहे. आजही हंपीत सर्वाधिक मंदिरे ही वैष्णव देवतांची आहेत म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल, बालकृष्ण, विष्णू इत्यादी.
विजयनगरचे राजचिन्ह
ह्याच्या समोरील बाजूस म्हणजेच द्वारातून आल्यावर डाव्या बाजूस तीन शिरे आणि एकच धड असलेल्या नंदीची एक अनोखी मूर्ती आहे. सहसा त्रिमुखी नंदी कुठे दिसत नाही.
त्रिमुखी नंदी
--
आतील प्रांगणाच्या डाव्या बाजूस शंभर स्तंभ असलेला सभामंडप किंवा कल्याणमंडप आहे. बहुतांश यात्रेकरुंचा मुक्काम येथेच असतो.
कल्याणमंडप
प्रांगणाच्या समोरील बाजूस रायाने-कृष्णदेवरायाने बांधलेले तीनमजली गोपुर आहे. ह्या गोपुरातून आत जाताच आपला प्रवेश श्री विरुपाक्ष मंदिराच्या रंगमंडपापाशी होतो. ह्या तीमजली गोपुरावरही विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. ह्या गोपुरातून आत येताच दोन्ही बाजूस मंडप, समोर प्रांगण, प्रांगणाच्या शेवटी रायाने बांधलेला रंगमंडप आणि रंग मंडपाच्या उजव्या बाजूस विरुपाक्षाची पत्नी पंपा अथवा भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. प्रांगणात दिपमाळ, बलीस्तंभ आणि नंदीमंडप आहेत.
रायगोपुर
(डावीकडून) रंगमंडप, पंपादेवी मंदिर, नंदीमंडप आणि बलीस्तंभ
दिपमाळ
कल्याणमंडप, रायगोपुर आणि मुख्य गोपुर
प्रांगणाच्या डाव्या बाजूकडील शतस्तंभी कल्याणमंडप
ह्यानंतर आपला प्रवेश होतो ते रंगमंडपात.
रंगमंडप
रंगमंडप हा विरुपाक्ष मंदिराच्या गर्भगृहाला जोडला गेलेला आहे. ह्याचे
बांधकाम कृष्णदेवरायाने शके १५८८ मध्ये केले ( इस. १५१०) तशा अर्थाचा
शिलालेख रंगमंडपाच्या बाहेर कोरून ठेवण्यात आलेला आहे. रंगमंडपाच्या
प्रवेशद्वारावर शिव पार्वती आदी मूर्ती आहेत तर खालच्या बाजूस ससा, मगर,
सिंह, व्याघ्र, हत्ती अश्या विविध प्राण्यांपासून निर्मित केलेल्या
व्यालाकृती आहेत. हीच ती प्रसिद्ध विजयनगर शैलीतील रचना. हंपीतील इतर
मंदिरांतही ह्या आगळ्या वेगळ्या शैलीतील व्यालशिल्पे दृष्टीस पडत जातात.
हंपीतील जवळपास सर्वच मंदिरातील स्तंभांवर हे व्याल व त्यावर आरूढ झालेल्या
स्वारांची कित्येक शिल्पे आहेत.
रंगमंडपाचे मुखदर्शन
रंगमंडपावरील शिवपार्वती प्रतिमा
सम्राट कृष्णदेवरायाचा शिलालेख
रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावरील व्यालशिल्प
रंगमंडप ३८ स्तंभांवर तोललेला असून त्यावर बाळकृष्ण, कृष्ण, मर्कटे, लक्ष्मीनृसिंह, गायवासरु अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर छताच्या बाजूच्या भिंतींवर विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. रंगमंडपातील सर्वात महत्वाचे आणि आवर्जून बघण्यासारखे म्हणजे येथील छतांवर चितारलेली भित्तीचित्रे. विष्णूचे दशावतार, द्रौपदीविवाहप्रसंगी अर्जुनाने केलेला मत्स्यभेद, मदनाने केलेल्या शिवाच्या तपस्येचा भंग इत्यादी खास विजयनगर शैलीत असलेली विविध रंगीत चित्रे येथे आहेत.
स्तंभावरील भारवाहक यक्ष
स्तंभशिल्पे
लक्ष्मी नृसिंह
छताच्या खालील बाजूकडील अनंतशयनी विष्णू
दशावतार भित्तीचित्र
मदनाने पुष्पबाणाद्वारे केलेला शंकराचा तपोभंग. मदनाच्या रथाला जोडलेले शुक येथे स्पष्ट दिसत आहेत.
शिवपार्वती विवाह (डाव्या बाजूस चतुर्मुखी ब्रह्मा आणि विष्णू आहेत)
अर्जुनाने केलेला मत्यभेद
द्रौपदीस्वयंवर
हे बहुधा कृष्णदेवरायाचे स्वारीचे किंवा हरिहर-बुक्काचे गुरु विद्यारण्य ह्यांच्या मिरवणुकीचे चित्रण असावे.
रंगमंडपाच्या शेवटी असलेले पुरुषमृग आणि नागशिल्प
रंगमंडप ओलांडून आपला प्रवेश अंतराळात होतो. अंतराळ म्हणजे गर्भगृह आणि रंगमंडप किंवा सभामंडप ह्याच्या दरम्यानचा लहानसा भाग. येथे गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस शैव द्वारपाल आहेत तसेच दोन्ही बाजूस अर्धमंडपही आहेत. अंतराळातील स्तंभांवर काही अनोख्या प्रतिमा आहेत.
ऋषी शिल्प
शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करणारी गाय
पुरुषमृग
पुरुषमृग प्रतिमा ही शुद्ध दाक्षिणात्य. अर्धा मनुष्य आणि अर्धा मृग असलेला हा काल्पनिक प्राणी शिवाचा मोठा भक्त समजला जातो.
कन्नप्पा नयनार
हा ६३ नयनारांपैकी एक असलेला शिवाचा प्रमुख भक्त. हा एक शिकारी असून शिवलिंगाला शिकार केलेले प्राणी अर्पण करत असे. एकदा शंकराने ह्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. कन्नपा पुजित असलेल्या शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. शिवाचा डोळा जखमी झालेला असून त्यातून वाहत असलेले रक्त थांबत नाही हे बघून कन्नप्पाने धारदार पात्याने स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाच्या डोळ्याच्या जागी लावला त्यामुळे त्या डोळ्यातून वाहणारे रक्त थांबले मात्र त्याचवेळी शिवलिंगावरील दुसर्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. हे पाहून कन्नप्पाने आपला दुसरा डोळाही काढण्याचे ठरवले. दोन्ही डोळे गेल्यामुळे शिवलिंगावरील रक्त वाहणार्या दुसर्या डोळ्याची जागा दिसणार नाही हे पाहून त्याने आपला एक पाय लिंगावरील डोळ्याच्या ठिकाणी ठेवला व आपला दुसरा डोळाही काढू लागला. त्याच्या ह्या अपूर्व भक्तीने शंकराने प्रकट होऊन त्याचे दोन्ही डोळे पुनर्स्थापित केले व त्याला आपल्या प्रमुख नयनारांमध्ये स्थान दिले.
कन्नपा नयनार प्रसंग
गर्भगृहात शिवलिंग असून त्याचे छायाचित्र घेता येत नाही.
रंगमंडपाच्या उजव्या बाजूस पंपादेवी आणि भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. आतील भागातील कलाकुसर ही चालुक्य शैलीतील आहे. गर्भगृहाच्या द्वारांवर पौराणिक प्रसंगांचा शिल्पपट आहे व आतमध्ये भुवनेश्वरी देवीची मूर्ती आहे. विरुपाक्ष मंदिराच्या प्रमुख गोपुरानंतर ह्या मंदिराचे शिखर सर्वात उंच आहे.
पंपादेवी मंदिराचे शिखर
मंदिरातील पौराणिक प्रसंग
ह्या मंदिराच्या बाजूला एक भुयारी मार्ग असून आतमध्ये शिवलिंग आहे. ह्याच्याच बाजूला म्हणजे विरुपाक्ष मंदिराच्या उजवीकडील कोपर्यात एक नवल पाहायलाच हवे असे आहे. मात्र ते दिसण्यासाठी तुम्हाला मंदिरात सकाळी दहा-अकराच्या सुमारास पोचावे लागेल. मंदिर संकुलाच्या इकडील भागात एक लहानशी खोली असून पूर्वेकडील म्हणजेच गोपुराच्या बाजूस खोलीच्या भिंतीस अस लहानसे छिद्र आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सकाळच्या सुमारास सूर्यकिरण येथील छिद्राद्वारे खोलीत प्रवेश करतात आणि गोपुराची उलटी प्रतिमा छिद्राच्या विरुद्ध बाजूकडील भिंतीवर पडते.
गोपुराची उलटी प्रतिमा
मंदिराच्या मागील बाजूस स्वामी विद्यारण्यांचे एक लहानसे मंदिर आहे.
मंदिरातून बाहेर आलो, आता उन्ह अगदी रणरणत होतं. मंदिराच्या शेजारीच एक लहानशी टेकडी आहे. विरुपाक्ष मंदिर संकुलाचे सर्वात सुंदर दृश्य जर कुठून दिसत असेल तर ते येथूनच.
हेमकूट टेकडी
विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस ही टेकडी, पूर्णपणे खडकाळ, टेकडीवर जायला एका भल्यामोठ्या सपाट पाषाणावरुनच चढावे लागते. चढावर, टेकडी सर्व बाजूंनी तटबंद आहे. आज ह्याचा काही भाग उद्ध्वस्त झालेला आहे. टेकडीवर जाताना भव्य प्रवेशद्वारे, चौकीची संरक्षक मेटं, आणि असंख्य मंदिरे आहेत. ह्या सर्वापेक्षाही देखणे आहेत ते इथले भव्य प्रस्तर. मॅजेस्टिक..! खडकांचं हे सौंदर्य अफलातून आनंद देतं.
हेमकूट टेकडी
हेमकूट टेकडीवर जाण्यासाठी असलेला भव्य प्रवेशदरवाजा
हेमकूट टेकडीवरील काही अवशेष
टेकडीवरील मेट
टेकडीवरील मंदिरसंकुल
हेमकूटावरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे गोपुर
टेकडीवरील भव्य प्रस्तर
वरील छायाचित्राचाच एक क्लोजअप
प्रस्तरांच्या खोबणीत खुबीने लपलेले एक स्थापत्य. हंपीतील स्थलदर्शनात अशी आगळीवेगळी स्थापत्ये कित्येकदा नजरेस पडत जातात.
प्रस्तरांतूनच बांधण्यात आलेली तटबंदी
हेमकूट टेकडीवरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिर संकुल
हेमकूटावरुन दिसणारा विरुपाक्ष मंदिराच्या पुढ्यातील परिसर आणि हंपी किंवा विरुपाक्ष बाजाराचे अवशेष
हेमकूट टेकडीच्या पायथ्याच्या दुसर्या बाजूस कडलेकलू गणेश मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे कृष्ण मंदिरावरुन जो रस्ता विरुपाक्ष मंदिराकडे येतो त्या रस्त्याच्या चढावर आहे. येथून उतरत्या रस्त्याने विरुपाक्ष मंदिरात पोहोचता येते. कडलेकलू गणेश मंदिर एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. मंदिरातील सभामंडपातील असंख्य स्तंभांवर सुंदर शिल्पे आणि गाभार्यात सुमारे १५ फूट उंचीची एकपाषाणी भव्य गणेशमूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपातून विरुपाक्ष मंदिर, उंच मातंग टेकडी, हंपि बाजार आणि सभोवतलाच्या प्रचंड प्रस्तरखंडांचे अफलातून दृष्य दिसते.
कडलेकलू गणेश मंदिर
मंदिरातील स्तंभांवरील शिल्पे
--
गणेशमूर्तीचे छायाचित्र घेण्याचे मजकडून राहूनच गेले, कसे राहिले माहित नाही पण राहून गेले हे खरे. कदाचित मला गाभार्यातील प्रमुख मूर्ती टिपण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळेही असेल.
हे सर्व पाहता पाहताच दुपारचे १२ वाजून गेले होते, उन्हाचा तडाखा जबर बसत होता. सकाळी नाष्टा भरपूर झाल्याने भूक अशी फारशी लागली नव्हती तेव्हा जेवणाआधी कृष्ण मंदिर आणि हंपीतील सुप्रसिद्ध अशा उग्रनृसिंह (लक्ष्मीनृसिंह) मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याविषयी पुढच्या भागात,
क्रमशः
बाकी काही शंका अहेत : विजापुरच्या आदिलशाहीच्या तडाख्यातुन हे सारे वाचलेच कसे ? ही मंदिरे बांधायला ह्यांच्याकडे इतका पैसा कोठुन आला ? ह्यांच्याकडेही राष्ट्रकुटांप्रमाणे अफाट व्यापारौदीम चालु होता काय ?
कुठे काय आहे आणि कसे जाता येईल एवढ्यावरच मी तो भाग पाहून निभावले होते. ते आता पाहतो आहे.
१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक
वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे
होती इत्यादी.
२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?
३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात
(उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे
आहे?
४) गावातच राहिल्याने रात्रसंचार करता आला ते महाभाग्यच.
५) फोटो चांगले वाटले तरी एक उणीव म्हणजे वाईड लेन्झमध्ये करेक्शन पाहिजे. खांबवगैरे फारच तिरपे होत आहेत.
६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?
७) कडलेकालू या मोठ्या गणेश मंदिराच्या बाजूलाच एवढाच मोठा ससिवेकालू गणेश आहे. गणेशाला असे अगदी सुरुवातीलाच ठेवले आहे.
८) एकूण सर्वच परिसर, मंदिरे नास्तिकालाही आस्तिक करून टाकतात अशी रचना आहे हे नि:संशय.
९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त
उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!.
तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला.
१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे होती इत्यादी.
कन्नप्पा नयनारचा प्रसंग नेमका कोणता हे मी थेट विरुपाक्ष मंदिराच्या पूजार्यांनाच विचारले होते, त्यांनी तो प्रसंग सविस्तर वर्णन करुन सांगितला. आपल्य पुराणांत कन्नपा नयनार मिळणार नाही, दाक्षिणात्य मूर्ती आहे.
२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?
होता की, भैरवाचे वाहन कुत्रा हे आहे तर चामुंडा काही वेळा शृगालावर आरुढ दिसते. पुराणातील शुनःशेप आणि श्वानाची कथा प्रसिद्ध आहे, महाभारतातही स्वर्गारोहणपर्वात धर्मराजाच्या कुत्र्याचा उल्लेख आहे अर्थात प्रक्षिप्त. भैरवाच्या जोडीला कुत्र्याची शिल्पे पुष्कळ आहेत.
३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात (उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे आहे?
तिथे एक आहे आणि तुम्ही म्हणताय ते मंदिर म्हणजे उत्किर्णित विष्णू मंदिर (inscribed Vishnu temple). तुलादानकमानीच्या समोरच आहे ते.
६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?
हो, काही प्रवेशद्वारांवर गणेश दिसतोच. शिवाय ससिवेकलू आणि कडलेकलू अशी गणेशाच्या भव्य मूर्ती असलेली दोन स्वतंत्र देवळे आहेतच.
९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!. तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला.
लाकडी रथ दुर्दैवाने एकही दिसला नाही.
कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर
कृष्ण मंदिर अर्थात बाळकृष्ण मंदिर
कमलापूरवरुन जाताना हंपीच्या मुख्य रस्त्यावरच आहे हे कृष्ण मंदिर. रस्त्याच्या उजवीकडे राजवाड्यांचा विभाग (Royal Enclosure) आहे तर त्याच्या पुढे गेल्यास रस्त्याच्या डावीकडे पहिले मोठे मंदिर लागते ते कृष्ण मंदिर. विरुपाक्ष मंदिरापासून हे मंदिर अगदीच जवळ आहे.
कृष्ण मंदिर हे पंचायतन स्वरुपात असलेले एक भव्य मंदिर. हे मंदिर सम्राट कृष्णदेवरायाने इस १५१३ साली त्याच्या उत्कल स्वारीतल्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.
पोर्तुगीज प्रवासी फेर्नांव नूनीझच्या वृत्तांतात कृष्णदेवरायाच्या ओरिसा स्वारीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे येतो.
कृष्णदेवरायाने गादीवर येताच आपला साम्राज्यविस्तार सुरु केला.
ओरीसावर स्वारी करुन त्याने उदयगिरीच्या किल्ल्याला ३४००० पायदळ आणि ८००
हत्तींसह वेढा घातला. किल्ल्यात १०००० सैन्याची शिबंदी होती आणि किल्ला
अतिशय मजबूत होता. सुमारे दीड वर्ष वेढा घालून रायाने किल्ल्यात जाण्याच्या
असंख्य वाटा तयार केल्या,मोठमोठे दगड फोडून मार्ग तयार केले, किल्ल्यात
जाणारी एकमेव वाट जी अतिशय अरुंद आणि दुर्गम होती ती त्याने सुगम करुन
घेतली आणि किल्ला जिंकला आणि ओरिसाच्या राजाच्या आत्याला कैद केले..
उदयगिरीचा किल्ला जिंकल्यावर रायाने कोडवीडवर स्वारी करुन त्याला वेढा
घातला. ओरिसाचा राजा तेराशे हत्ती, वीस हजार घोडदळ आणि पन्नास हजार
पायदळासह चालून आला. हे पाहून रायाने शहरात काही सैन्य ठेवून नदीपाशी आपला
तळ उभारला. ओरिसाचा राजा नदीच्या दुसर्या तीरावर ससैन्य उभा होता. तो नदी
ओलांडून येत नाही हे पाहताच रायाने नदी ओलांडून त्याच्यावर स्वारी केली आणि
घमासान लढाईत उत्कलराजाचा पराभव केला. राया नंतर कोंडापल्ली ह्या
ओरिसाच्या राजधानीच्या ठिकाणी गेला आणि तीन महिने वेढा घातल्यावर त्याने
राजधानी जिंकली. आणि ओरिसाच्या परागंदा राजास मी तुझी येथे रणभूमीवर वाट
पाहात आहे असे कित्येक निरोप पाठवले, पण तो कधीच आला नाही, कोंडापल्लीस
रायाने अनेक मंदिरांना देणग्या दिल्या. तिथे एक भव्य मंदिर बांधून त्याने
एक शिलालेख रोविला तो असा, 'कदाचित ही अक्षरे जेव्हा मिटून जातील तेव्हा
ओरिसाचा राजा विजयनगरच्या राजाशी सामना करेल, ओरिसाच्या राजाने जर ही
अक्षरे मिटवली तर त्याच्या राणीस विजयनगरच्या राजाच्या घोड्यास नाल
ठोकणार्या लोहारांच्या हाती दिले जाईल'.
ह्यानंतर ओरिसाच्या राजाने तह करुन सम्राट कृष्णदेवरायास आपली मुलगी दिली,
रायाने पण तीचा पत्नी म्हणून स्वीकार करुन उत्कल राजाला नदीपलीकडचा मुलुख
परत करुन नदीअलीकडचा मुलुख स्वतःकडे ठेवला.
कृष्णमंदिरातली मुख्य मूर्ती हि बाळकृष्णाची होती जी आज तेथील मंदिरात नसून चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातील आतल्या भागावर कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे प्रसंग कोरलेले आहेत.
कृष्ण मंदिर
गोपुरातील आतील भागांवर असलेले विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन
पंचायतन स्वरुपातल्या या मंदिरात काही उपमंदिरे, उपमंडल, पाकशाळा आहेत. मुख्य मंदिराच्या तलविन्यासात एक गर्भगृह जिथे बाळकृष्णाची मूर्ती होती, एक अर्धमंडप, महामंडप आणि तीन बाजूंना खुला असणारा भव्य सभामंडप आहे. हंपीतील बर्याच मंदिरांची रचना काहीशी अशीच आहे. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच एक शिलालेख असून त्यावर मंदिर निर्माण आणि उत्कल प्रदेशावरील विजयाबद्दल लिहिलेले आहे.
कृष्ण मंदिर प्रांगण आणि शिलालेख
शिलालेख
कृष्ण मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सभामंडपातील स्तंभावर असलेल्या प्रचंड व्यालमूर्ती. व्याल हे सिंहासारखे काल्पनिक पशू. हे दुष्ट शक्तींना प्रतिबंध करतात अशी समजूत.
स्तंभांवरील व्याल
स्तंभांवरील व्याल
कृष्ण मंदिरातील सभामंडपा हा अनेक स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांवर कृष्णाच्या जीवनातले असंख्य प्रसंग कोरलेले आहेत. हे मंदिर बाळकृष्णाचे असल्याने त्याचे गोकुळातील आणि मथुरेतील प्रसंगच येथे प्रामुख्याने आहेत.
कृष्णमंदिरातील सभामंडप
सभामंडप एका वेगळ्या कोनातून
बाळकृष्णास उखळाला बांधल्याचा प्रसंग
कालियामर्दन
सिंहासनावर बसलेल्या कंसाचा केश ओढून कृष्णाने केलेला वध
मंदिराच्या शिखरांवर गरुड, दशावतार अशी विविध शिल्पे आहेत.
मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण
मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आणि उपमंडप
मुख्य मंदिर आणि उपमंदिरं
मुख्य मंदिर, उपमंडप आणि उपमंदिर
मंदिर बघून बाहेर आलो, रस्त्याच्या पलीकडील बाजूस आहे तो असंख्य मंडपांनी, दुकानांनी युक्त असलेला कृष्ण बाजार, एकेकाळी गजबजून गेलेला हा कृष्ण बाजार आज भग्नावस्थेत आहे.
कृष्ण बाजार
कृष्णबाजारातील पुष्करिणी आणि दुकांनातील स्तंभ
ह्यानंतर आम्ही निघालो ते येथून अगदी जवळच असलेल्या हंपीतील प्रसिद्ध लक्ष्मीनृसिंहाकडे
लक्ष्मीनृसिंह अर्थात उग्रनृसिंह मंदिर
हंपीतील ही सर्वात विशाल मूर्ती. हंपी म्हटल्यावर दोन गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात, एक विठ्ठल मंदिरातील दगडी रथ आणि दुसरी म्हणजे उग्रनृसिंहाची ही भव्य मूर्ती. ही उग्रनृसिंहाची मूर्ती लक्ष्मीनृसिंहाची होती, आजमितीस लक्ष्मी पूर्णपणे भग्न झालेली असून तिचा फक्त एक हात आपल्याला दिसतो. मूळचा लक्ष्मीनृसिंह हळूहळू उग्रनृसिंह म्हणून प्रचलित झाला.
६.७ मीटर उंच असलेली ही मूर्ती इस १५२८ साली सम्राट कृष्णदेवरायाच्या आदेशाने एका भव्यशिलाखंडावर कोरण्यात आली आणि कृष्णभट्टाच्या हस्ते हिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लक्ष्मी-नृसिंह
शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. नृसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या सात फण्यांच्या साहाय्याने छ्त्र धरिले आहे. नृसिंह चतुर्भुज असून त्याचे चारही हात भग्न आलेले आहेत. त्याच्या डावी मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून आज केवळ तिच्या उजव्या हाताचा भाग नृसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लपेटलेला दिसतो. दाक्षिणात्य पद्धतीचा मुगुट घालून बसलेल्या नृसिंहाचे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असून त्याच्या कराल दाढा विचकलेल्या आहेत. शेषनागाच्या वेटोळ्याच्या बाजूस मकरतोरण आहे.
लक्ष्नीनृसिंह
उजव्या बाजूस लक्ष्मीचा हात दिसत आहे.
ही मूळ मूर्ती कशी असावी ह्याची काहिशी कल्पना आपल्याला येथीलच विरुपाक्ष मंदिरातील स्तंभावर असलेल्या लक्ष्मीनृसिंहाच्या मूर्तीवरुन येते.
ह्या मूर्तीच्या शेजारीच आहे ते बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
हे मंदिर अगदीच छोटेखानी पण इथले शिवलिंग हंपीतील सर्वात भव्य. दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर. अगदी साध्याश्याच असलेल्या ह्या मंदिरात एकाच पाषाणापासून तयार केलेले ३ मीटर उंचीचे भव्य शिवलिंग आहे. शिवलिंगावर शंकराचे तीन डोळे कोरलेले आहेत. जवळच असलेल्या लहानश्या कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते. एका गरीब शेतकरी स्त्रीने हे शिवलिंग स्थापित केले अशी दंतकथा आहे. बडवा म्हणजे गरीब म्हणूनच याचे नाव बडवीलिंग पडले असे मानतात.
लक्ष्नीनृसिंह आणि बाजूलाच असलेले बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग
शिवलिंगावर कोरलेले शंकराचे तीन डोळे
हंपीतील हा भाग आहे विलक्षण सुंदर, एका बाजूला शाही निवास तर दुसर्या बाजूस केळीच्या हिरव्यागार बागा. इथल्या कालव्यामुळे हा भाग अतिशय हिरवागार आहे. ही मंदिरे बघेपर्यंत जवळपास दीड वाजत आले होते, उसाचा रस पिवून आम्ही आता परत निघालो ते कमलापूरला दाक्षिणात्य पद्धतीच्या मेसमध्ये जेवायला, त्यानंतर जायचे होते ते शाहीभागात कमलमहाल, हत्तीपागा बघायला त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
अंतःपुर, पद्ममहाल आणि गजशाळा
हंपीचे भग्नावशेष मुख्यतः दोन भागांत विभाजित झालेले आहेत, पवित्र परिसर (sacred centre) आणि शाही परिसर (Royal centre). पवित्र परिसरात मुख्यतः मंदिरे तर शाही परिसरात राजवाडे, महाल, मंत्रालये इत्यादी आहेत. तसं बघायला गेलं तर हंपीच्या विस्तीर्ण परिसरात जिथे नजर जाईल तिथं काहीना काही अवशेष आहेतच. ह्याच शाही परिसरात आहे अंतःपुर अर्थात राणीवसा.
अंतःपुर / राणीवसा (zenana enclosure)
शाही परिसरात असलेले हे अंतःपुर हे राजपरिवारातील स्त्रियांची निवासस्थाने असलेला खाजगी भाग. चारही बाजूंनी तटबंदीने संरक्षित असलेल्या अंतःपुराला दोन प्रवेशद्वारे असून आतमध्ये राण्यांची निवासस्थाने, सुप्रसिद्ध पद्ममहाल, जलमहाल आणि पुष्करीणी आहेत. तटबंदीवर संरक्षणासाठी चार कोपर्यात चार उंच निरिक्षण मनोरे (watch tower) आहेत, पैकी आज तिथला एक मनोरा पूर्णपणे नष्ट झालेला असून तीन आजही अस्तित्वात आहेत. हे दुमजली मनोरे इंडोइस्लामिक शैलीत बांधलेले आहेत
हजारराम मंदिर, शाही राजवाड्यांवरुन पुढे जाताच अंतःपुर आहे. अंतःपुरात राजाशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसे व पहार्यावर हिजड्यांची नेमणूक केली जात असे. ह्याशिवाय अंतःपुरात देवदासींनाही प्रवेश असे. पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्याच्या वृत्तांतात ह्या स्त्रियांचे वर्णन आले आहे.
पाईश लिहितो,
देवळातल्या मूर्तीला नैवैद्य दाखवताना मूर्तीपुढे स्त्रियांचे नृत्य होते, ह्या स्त्रिया देवाला वाहिलेल्या (देवदासी) असतात. त्या देवाला अन्न इत्यादी आवश्यक वस्तू देतात. ह्या स्त्रियांना झालेल्या मुलीही देवदासीच ठरतात. ह्यांचे चारित्र्य स्वैर असते. शहरांतल्या चांगल्या भागात प्रमुख मार्गांवर त्या राहतात. अशा स्त्रियांच्या वस्तीतील घरे उत्तम प्रतीची असतात. अधिकारी आणि श्रीमंत वर्गातील अंगवस्त्रे म्हणून राहणार्या या स्त्रियांना बराच मान मिळतो. कोणताही सद्गृहस्थ काहीही ठपका न येता यांच्याकडे उघडपणे जाऊ शकतो. या स्त्रियांना राजाच्या अंत:पुरातही प्रवेश असतो. त्या तिथे राजस्त्रियांमध्ये राहून त्यांच्या समवेत तांबूल सेवन करतात. इतर कोणाही व्यक्तीला हे करता येत नाही मग तिचा दर्जा कितीही मोठा असो.
पाईश पुढे तांबुल (विड्याचे) वर्णन करतो ते असे,
हा विडा म्हणजे मिरवेल किंवा आपल्याकडचे आयव्हिसासारख्या वनस्पतीचे एक पान असते. हे पान येथील लोक नेहमी खातात, त्यांच्याबरोबर तोंडात सुपारी धरतात. ही आपल्याकडील मेंडलर फळासारखी मात्र जास्त टणक असते. ती श्वासदुर्गंधी घालवते आणि अनेक तर्हेने गुणकारी असते. खाण्याचे रिवाज आपल्यापेक्षा वेगळे असणार्या या लोकांना ती अनेक प्रकारे उपयुक्त आहे. काही लोक मांसाहारी आहेत पण ते गाय, डुक्कर सोडून इतर सर्व प्रकारचे मांस खातात. त्यांचेदेखील दिवसभर पान खाणे चालूच असते.
निरीक्षण मनोर्यांनी संरक्षित असलेले तटबंदीयुक्त अंत:पुर
तटबंदी व निरीक्षण मनोरा
पाईशच्या वृत्तांतात अंतःपुराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.
राजाला (कृष्णदेवरायाला) तीन कायदेशीर बायका असून याच तीन प्रमुख आहेत. ह्या प्रत्येक राणीचा निराळा महाल असून प्रत्येकाच्या दासदासी, नोकरचाकर आणि स्त्री अंगरक्षक आहेत. सर्व नोकर स्त्रिया आहेत. या ठिकाणी पुरुषांना मज्जाव आहे. फक्त महालांवर पहारेकरी म्हणून हिजडे आहेत. राजाच्या मर्जीतील उच्चपदस्थ वृद्ध पुरुष सोडल्यास ह्या स्त्रिया इतर कोणाही पुरुषांच्या दृष्टीस पडत नाहीत. जेव्हा त्यांना बाहेर जावयाचे असते तेव्हा पडद्याने आच्छादित केलेल्या पालखीत त्यांना घेऊन जातात. पालख्यांबरोबर चांगले तीनशे ते चारशे हिजडे असतात आणि इतर सर्व लोक लांब अंतरावर उभे राहतात. प्रत्येक राणीकडे भरपूर पैसा आणि तितक्याच प्रमाणात मोती, बाजूबंद, बांगड्या, रत्ने इत्यादी ऐवज असल्याचे आम्हास सांगण्यात आले. प्रत्येक राणीजवळ साठ दासी असून त्याही हिरे, मोती, माणके यांनी सजलेल्या असतात असे म्हणतात. या दासी धरुन अंतःपुरात एकूण बरा हजार स्त्रिया आहेत. ह्यामध्ये ढाल तलवार चालवणार्या, कुस्ती खेळणार्या, तुतारी शिंगे अशा आपल्यापेक्षा वेगळी वाद्ये वाजवणार्या अशा स्त्रिया आहेत. तसेच भोई आणि परीट कामासाठादेखील स्त्रियाच आहेत आणि राजाकडील व्यवस्थेप्रमाणे इथे अंतःपुरात देखील कामाची व्यवस्था आहे, एव्हढेच की ती सर्व कामेदेखील स्त्रियाच करतात. तिन्ही पट्टराण्यांकडे तंटा किंवा नाराजी होऊ नये म्हणून तिघींनाही सर्व गोष्टी सारख्या प्रमाणात मिळतात. तिन्ही राण्यांमध्ये स्नेहभाव असून त्या स्वतंत्र राहतात यावरुन एव्हढे लोक राहणारे वाडे सामावणारे हे आवार किती मोठे असेल याची कल्पना येईल.
पाईश पुढे लिहितो,
खुद्द राजा महालातच पण वेगळा राहतो. आपल्या कोणत्याही राणीस भेटण्याची इच्छा झाल्यास तो हिजड्याकरवी तसा निरोप पाठवून तिला बोलवून घेतो. राणी राहते तिथे अंतःपुरात हिजडा जात नाही. दारावरील स्त्री रक्षकांना तो राजाचा संदेश असल्याचे सांगतो. नंतर राणीची एखादी वरिष्ठ दासी येऊन राजाचा काय निरोप आहे ते पाहते आणि मगच राणी राजाकडे येते किंवा राजा राणीकडे जातो आणि इतरांना काहीही सुगावा लागू न देता तो पाहिजे तितका वेळ राणीच्या सान्निध्यात राहतो. हिजड्यांपेकी काही लोक राजाच्या खास मर्जीतील आहेत. ते राजाच्या शयनगृहातच झोपतात आणि त्यांना पगारही भरपूर मिळतो.
राणीच्या राजवाड्याचे भग्नावशेष
संरक्षण मनोरेयुक्त तटबंदी
तटबंदी आणि पुष्करिणी
संरक्षण मनोरा व बाजूस असणारे रंगा मंदिर
ह्या अंत:पुरातच आहे एक अद्वितीय वास्तु ,ती म्हणजे पद्ममहाल
पद्ममहाल (Lotus Mahal)
पद्ममहाल ही अत्यंत देखणी वास्तु, अंतःपुरात प्रवेश करताच इंडो इस्लामिक शैलीत बांधलेली ही दुमजली इमारत आपले लक्ष वेधून घेते. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित येण्यास पद्ममहालाचा वापर केला जात असावा असे मानण्यात येते. तालिकोटच्या लढाईत रामरायाचा पराभव झाल्यानंतरच्या ६ महिन्यांच्या विजयनगरच्या विध्वंसात वाचलेल्या मोजक्या वास्तूंपैकी ही एक ती बहुधा तिच्या इंडोइस्लामिक शैलीमुळेच. अर्धोन्मिलित कमलांप्रमाणे उमललेल्या एकामागे एक असलेल्या महिरपींच्या रचनेमुळेच हिला कमलमहाल अर्थात पद्ममहाल हे नाव मिळाले.
सर्व बाजूंनी देखण्या महिरपी असणार्या ह्या दुमजली पद्ममहालाला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना आहे. वरच्या मजल्यावरही महिरपीयुक्त सज्जे असून त्यावर पडदे टांगण्यासाठी सोयी आहेत. ह्या वास्तुच्या छताची रचना मंदिराच्या शिखरांप्रमाणे केलेली आहे.
पद्ममहाल
पाईशच्या वर्णनात अंतःपुरातील एका दुमजली वास्तूचे वर्णन येते, हंपीच्या शाही परिसरातील अवशेषांत एकांवर एक दालने असलेली एकच वास्तू आहे, पाईशच्या वर्णनात असलेल्या वास्तूशी पद्ममहालाचे थोडेफार साम्य आहे.
पाईश लिहितो,
या निवासात प्रवेश करताच डाव्या बाजूला एकावर एक अशी दोन दालने आहेत, ती येणेप्रमाणे- खालचे दालन जमिनीच्या पातळीपेक्षाही खाली आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या दोन पायर्या आहेत. येथून ते छतापर्यंत आतून सोन्याचा पत्रा जोडलेला आहे. ह्याचा बाहेरील भाग घुमटाप्रमाणे आहे. या निवासस्थानाला चार बाजू असलेली मंडपी असून ती विणलेल्या वेताची आहे. त्यावर माणिक, हिरे, मोती इत्यादिंचे रत्नखचित नक्षीकाम केलेले आहे. तिच्यावर दोन सोन्याचे गोल टांगलेले आहेत, या सुवर्णगोलांवरील जडावाचे काम बदामी आकाराचे आहे, त्यांच्यावर बारीक मोत्यांचे घट्ट्विणीचे जाळीदार नक्षीकाम केलेले आहे. घुमटावर देखील असेच गोल आहेत. या दालनात एक पलंग होता ज्याच्या पायावरील नक्षीकाम मंडपीप्रमाणे होते. पलंगाच्या उभ्या आडव्या दांड्या सोनेरी होत्या आणि त्यावर काळ्या मखमलीची गादी होती. त्याच्या चोहोंबाजूस वीतभर उंचीचा कठडा असून त्या कठड्याला मोती लावलेले होते. पलंगावर दोन तक्के असून इतर कोणतेही आच्छादन नव्हते. वरच्या दालनात काय होते ते मी सांगू शकणार नाही कारण मी ते पाहिले नाही. मी फक्त उजवीकडील खालचे दालन पाहिले. या प्रासादात कोरीव पाषाणाचे स्तंभ असलेले एक दालन आहे, वरपासून खालपर्यंत भिंतीसहित हे दालन हस्तीदंताचे बनलेले असून वरच्या तुळयांना आधार देणार्या गुलाब व कमलपुष्पांचे हस्तिदंती काम केलेले आहे. त्याची कारागिरी इतकी चांगली आहे हे असे काम इतरत्र आढळणे कठिण, याच बाजूस ह्या राज्यात येणार्या सर्व लोकांच्या, अगदी आम्हा पोर्तुगीजांपर्यंत- आयुष्याची धाटणी दाखविणार्या तसबिरी रंगवलेल्या आहेत. अंतःपुरातील राण्यांना त्यामुळे बाहेरील देशांतील रितिरिवाजाची माहिती होते. अंध व भिकारी ह्यांच्यासुद्धा तसबिरी आहेत. इथे दोन सोन्याची सिंहासने असून पडदे असणारा एक चांदीचा पलंग आहे. या ठिकाणी मला एक हिरव्या गारेचा लहानसा तुकडा दिसला. याला फार महत्वाचा समजतात. या पाट्याजवळ म्हणजे राजवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या कमानीखाली एक कुलुप लावलेला लहान दरवाजा होता. या ठिकाणी आत पूर्वीच्या एका राजाचा खजिना आहे असे आम्हांला सांगण्यात आले.
पद्ममहाल
पद्ममहाल समोरुन
पद्ममहाल एका वेगळ्या कोनातून
महिरपी रचना
ही देखणी वास्तू पाहून झाल्यावर आपण अंतःपुराच्या मागील भागातून बाहेर पडताच एक देखणी आणि सुपरिचित वास्तू आपल्याला सामोरी येते ती म्हणजे हत्तीपागा.
गजशाळा (Elephant Stable)
हंपीतील सुस्थितीत असलेल्या वास्तूंपैकी एक म्हणजे हत्तीपागा. घुमटाकार शिखरं असलेली हि लांबच लांब इमारत. विजयनगरच्या सम्राटांचे शाही हत्ती ठेवण्यासाठी असलेली ही गजशाळा उर्फ हत्तीपागा. एकूण ११ प्रचंड कक्ष असलेल्या ह्या गजशाळेची मधला कक्ष हा मोठा असून त्याच्यावर हिंदू पद्धतीच्या शिखराची रचना जी आज भग्न झालेली आहे. तर ह्या कक्षाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच पाच कक्ष असून प्रत्येकीचे शिखर घुमटाकार असलेल्या इस्लामिक शैलीत आहे. त्या घुमटांवर कमलपुष्पांच्या रचनेने फेर धरला आहे.
गजशाळेतील कक्षांच्या आतील बाजूस गजांना बांधण्यासाठी धातूचे आकडे असून ते आजही पाहता येतात, प्रत्येक कक्षात मागच्या बाजूस माहुतांना आत येण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे.
गजशाळा
गजशाळा
विजयनगरच्या गजांचे वर्णन करतांना पाईश लिहितो,
हत्तींवर झालरी असलेल्या मखमली, जरतारी झुली घातलेल्या असून शिवाय इतरही रंगीबेरंगी वस्त्रे भरपूर घातलेली असतात. वस्त्रांना दोन्ही बाजूंना लावलेल्या घटांच्या नादाने आसमंत भरुन जातो. हत्तींच्या गंडस्थळावर राक्षसमुखाची किंवा इतर अनेक मोठ्या प्राण्यांची चित्रे चितारलेली आहेत. चुणीदार अंगरखा घातलेली तीन/चार माणसे हत्तींच्या पाठीवर बसलेली असून त्यांच्या हातात ढाली, बरच्या असतात, जणू काही ते स्वारीसाठी सज्ज झालेले आहेत.
गजशाळा
ही गजशाळा बघून आम्ही परत फिरलो, अंतःपुर ओलांडून आलेल्या मार्गाने तटबंदीच्या बाहेर आलो. तिथेच एक पुरातत्वखात्याचे एक लहानसे खुले संग्रहालय आणि कार्यालय आहे. संग्रहालयात विजयनगरच्या भग्नावशेषांतील काही मूर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. शनिवार असल्याने संग्रहालय बंद होतं त्यामुळे आत काही जाता आलं नाही मात्र बाहेरुन जितक्या मूर्ती दिसल्या तितक्या पाहता आल्या.
संग्रहालयातील मूर्ती
अंतःपुर नकाशा
इथवर येईतो दुपारचे तीन साडेतीन वाजले होते, उन्ह अगदी रणरणत होतं. आता आमचा पुढचा टप्पा होता ते इथलं जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर त्याविषयी पुढच्या आणि शेवटच्या भागात.
क्रमशः
हंपी एक अनुभव
कर्नाटकातले हम्पी म्हणजे मुबाईहून जवळ जवळ चौदा तासांचा प्रवास. हा प्रवास करोना नंतरच्या परिस्थितीत स्वतःच्या गाडीने करायचा म्हणजे सर्व काळजी नीट घेणं आवश्यक होतं. साधारण सातशे पन्नास किलोमीटर आहे मुंबई-हंपी अंतर. म्हणजे चौदा तास तर नक्की. मग ठरवलं मुंबई ते बेळगाव असा प्रवास करायचा आणि मग बेळगाव ते हंपी. त्याप्रमाणे तयारी केली. शक्यतोवर घरगुती राहण्याची सोय (होम स्टे) सारखं काही असल्यास पाहायचं. एकतर ते स्वस्त असतं आणि कमी लोक अशा ठिकाणी जात असल्याने सध्यासाठी योग्य असेल. मग बेळगावमध्ये home stay असं गूगल मित्रावर शोधलं आणि अनेक पर्याय मिळाले. अगदी मोठासा बंगला आणि त्यातल्या एक किंवा दोन खोल्या राहण्यासाठी देणारे पर्याय देखील होते. त्यातल्याच एका घरातली खोली फोनवरून राखून ठेवली आणि एक दिवस भल्या पाहाटे निघाले.
मुद्दाम ठरवून मुंबई-पुणे महामार्गावर थांबले नाही. पुण्याच्या पुढे महाबळेश्वरला जाण्याचे जे वळण आहे त्याअगोदर एक लहानसा मॉल आहे. तिथे पोहोचायला मला साधारण साडेचार तास लागले. तिथे थांबून व्यवस्थित खाऊन घेतले. मॉल मधील स्वच्छतागृह खरंच चांगले असल्याने काहीच प्रश्न उदभवला नाही. तिथून निघाल्यावर मात्र कुठेही न थांबता थेट बेळगाव गाठले. मुंबई-बेळगाव चारशे चौर्याऐंशी किलोमीटर्स आहे. म्हणजे साधारण आठ तास. मी मधला थांबण्याचा वेळ धरून देखील सात तासात पोहोचले. एकतर पुण्याच्या पुढचा रस्ता चौपदरी आणि अत्यंत सुंदर आहे; आणि मला कुठेही फार वाहतूक जाणवली नाही. बेळगावात पोहोचले आणि खोली ताब्यात घेऊन मस्त ताणून दिली. संध्याकाळी उठून थोडी चालून आले आणि त्याचवेळी एका उडपी हॉटेलमध्ये मस्त डोसा, इडली आणि तिथली खास बनवलेली कॉफी घेतली. सकाळी सहा पर्यंत निघण्याचा विचार होता. मात्र घरमालकांनी मला सांगितलं की इथून तुम्ही फार तर चार तासात हंपीला पोहोचाल. का घाई करता. आठ पर्यंत निघालात तरी अगदी वेळेत पोहोचाल. तसही हंपी सोबतच तुम्ही पहिल्यांदा जिथे उतरणार आहात त्या सानापूरला देखील निसर्ग सुंदर आहे. मालकांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी काहीशी आरामातच निघाले. पोहोचण्याची घाई नव्हती. त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग पाहात अगदी निवांतपणे गाडी चालवत होते. प्रशस्त रस्ते आणि अजिबात नसलेली वाहातुक यामुळे गाडी चालवणे म्हणजे सुख वाटत होतं.
आजूबाजूच्या निसर्गात मी इतकी अडकत गेले की काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की गुगुल बाईने मला जो रस्ता सांगितला आहे तो गावांमधून जातो आहे.... म्हणजे नक्की मी रस्ता चुकले आहे. कारण बेळगाव सोडताना मला घरमालक म्हणाले होते; सुंदर हमरस्ता आहे. तुम्हाला कुठेही काहीही अडचण येणार नाही. लहान-लहान गावं लागायला लागल्यावर मी थोडी गडबडले आणि एक दोन ठिकाणी गाडी थांबवून रस्ता विचारला. प्रत्येकजण सरळ पुढे जाण्याबद्दल सांगत होतं. त्यामुळे रस्ता चुकले नसून कोणतं तरी वेगळं वळण घेतलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं. 'जोपर्यंत अंधार होत नाही आणि गाडीमधलं पेट्रोल लाल कात्यापर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते'; हे माझ्या भावाचं तत्व मनात ठेऊन पुढे जात होते. मनात भिती नसल्याने उलट आजूबाजूला लागणारी शेतं आणि पवनचक्क्या पाहात आणि या अफाट पसरलेल्या निसर्गाचा मनमुराद अनुभव घेत मी पुढे जात होते. साधारण एकच्या सुमारास मला सानापूर पंधरा मिनिटांवर दिसायला लागलं आणि मी जिथे माझी खोली राखून ठेवली होती तिथे फोन केला. ज्याने फोन उचलला त्याने लगेच मला लोकेशन पाठवलं आणि मग मात्र त्या लोकेशनच्या अनुषंगाने गाडी हाकत मी निघाले. आता आजूबाजूची हिरवाई संपून मोठे मोठे दगड दिसायला लागले होते. पण खरं सांगू.... त्या उंच अजस्त्र दगडांमध्ये देखील एक वेगळंच सौंदर्य होतं. डिसेंबर महिना असल्याने फार उकडत नव्हतं. मग गाडीच्या काचा खाली करत दर पाच मिनिटांनी थांबून फोटो काढत मी पुढे सरकत होते.
चुकलेल्या रस्त्यावरील दगडांचे वैभव.
दूरवर पसरलेली हिरवाई.
नक्की कोणता रस्ता घेऊ हा प्रश्न पडला होता मला
चारिकडे पसरलेला निसर्ग.
हरवलेल्या रस्त्यावर सापडलेली पवनचक्की.
वळणावरचे झाड वाकडे
डोळ्यांना सुखावणारी शेतं आणि त्यात विहारणारे स्वच्छंद पक्षी.
सानापूर जवळ आलं आणि मी परत एकदा त्याच मुलाला फोन लावला.
"Madam, keep driving and come straight. I Am standing on the road." त्याने मला म्हंटलं आणि त्याच्याशी हे बोलेपर्यंत मला तो दिसला देखील. एक पोरगेलासा लाल टीशर्ट घातलेला काळा पण हसऱ्या चेहेऱ्याचा तरुण होता. गाडीतून हात बाहेर करून मी त्याचं लक्ष वेधलं आणि त्याने खूण केल्याप्रमाणे गाडी आत वळवली.
मी गाडीतून उतरले आणि................. माझ्या समोर स्वर्ग होता जणू!!! समोर पाच सुंदर झोपड्या होत्या. मध्ये थोडं अंतर ठेऊन एक मोठा आणि खुला हॉल होता. जिथे खाण्यासाठी बसण्याची सोय होती. संपूर्ण बांधकाम बांबू आणि नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांनी केलेलं होतं. पण त्यात जे सौंदर्य होतं ते तुम्हाला कोणत्याही पंच तारांकित हॉटेलमध्ये दिसणार नाही. आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांच्या खळगीतलं सानापूर हे अगदीच लहानसं आणि गोंडस गाव. त्यात हे असं गावातल्या घरात राहिल्यासारखा अनुभव. अजून काय हवं हो?
फक्त पाच खोल्या (झोपड्या) आलेलं हॉटेल!
निसर्गाच्या सानिध्यातला होम स्टे.
स्वच्छ नीटनेटकी आणि आवश्यक सुविधा असलेली खोली.
रेस्टॉरंट!!
अत्यंत नेटकी, स्वच्छ आणि आवश्यक एवढी प्रशस्त खोली आणि अत्यंत स्वच्छ आणि गरजेच्या सगळ्या सोयी असणारं स्नानगृह. अजून काय हवं असतं? प्रवासाने काहीशी दमले होते आणि भूक देखील लागली होती. पटकन फ्रेश होऊन बाहेर आले आणि समोरच्या हॉलमध्ये गेले. सुंदर बैठकी केलेल्या होत्या. एका टेबलावर साधारण आठजण सहज बसू शकतील अशी दहा-बारा टेबलं होती. बसायला साध्याशा गाद्या. एका टेबलाजवळ बसत मी चौकशी केली काय मिळेल खायला? मला वाटलं होतं साधंसं गाव आणि त्यात हे असलं साधं राहण्याची सोय असलेलं ठिकाण; म्हणजे टिपिकल काहीतरी चायनीज आणि पंजाबी जेवणाचे प्रकार असतील. मनाची तशी तयारी देखील मी केली होती. पण आश्चर्य म्हणजे तिथे सगळं काही मिळत होतं. अगदी कॉन्टिनेनटल पासून ते पिझा-पास्ता... सिझलर्स, पंजाबी आणि डाएट फूड देखील. मेन्यूकार्ड बघून जितकं आश्चर्य वाटलं तितकीच मजा देखील वाटली.
जेवताना थोडी माहिती घेत होते आजूबाजूला काही प्रेक्षणीय आहे का. त्यावेळच्या गप्पांमध्ये कळलं की हा 'होम स्टे' तीन तरुणांनी मिळून सुरू केला आहे. हंपी मधील हिप्पी आयलंड खूपच प्रसिद्ध होतं.... अनेक कारणांनी. परंतु कर्नाटक सरकारने ते बंद करून टाकलं.... त्याच त्या 'अनेक कारणां'साठी. ही मुलं तिथे काम करायची. अचानक हातातलं काम गेलं आणि त्याचवेळी करोना माहामारी सुरू झाली. पुढचं भविष्य एकदम अंधःकारमय वाटायला लागलं. त्यातल्या एकाची ही थोडीफार जमीन होती. तिघांनी हिम्मत करून आजवर जमवलेले आणि थोडे उसने पैसे घेत हे 'होम स्टे' स्वतःच्या हातानी बनवलं. नुकतीच सुरवात केली होती त्यांनी. त्यांच्या हिमतीच मला खरंच खूप कौतुक वाटलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलं अजिबात शाळेत गेली नव्हती; आणि तरीही भारतीय भाषांसोबत फक्त इंग्रजीच नाही तर फ्रेंच, इटालियन आणि अशा अनेक भाषा असख्लीत बोलत होती. 'हिप्पी आयलंड' की देन है! म्हणाले.
सकाळपासून गाडी चालवून तशी दमले होते. त्यामुळे थोडावेळ आराम करायचा ठरवलं. उद्यापासून हंपी बघायला सुरवात करणार होते. पण आजचा दिवस तसा मोकळा होता. बेळगावच्या घरमालकांनी सांगितलेलं आठवत होतं. त्यामुळे माझ्या खोलीकडे जायच्या अगोदर त्या मुलांकडून माहिती घेतली की या सुंदर पण इटुकल्या गावात काही बघण्यासारखं आहे का? त्यांनी सांगितलेलं समजून घेतलं आणि आराम करायला खोलीत गेले.
दोन तासांनी गाडी घेऊन मी निघाले. 'होम स्टे' च्या पुढे गावातून अगदी पाच मिनिटं पुढे गेले आणि एक उजवीकडचं वळण घेतलं. थोडेसे उतार-चढाव आणि लहानसा रस्ता कापत पुढे गेले. एक लहानसं वळण पार केलं आणि माझ्या समोर निसर्गाचा एक अप्रतिम तुकडा पसरला होता. एका नदीचं पात्र... मस्त मोठंसं समोर होतं. आत दूर दोन टोपलीच्या होड्या होत्या. असेच एकटे दुकटे प्रवासी त्या होड्यांमधून नदीमध्ये फिरत होते. एक अजून होडी दिसत होती किनाऱ्यावर. मला गाडीतून उतरताना बघून होडीचा मालक आला विचारायला. पण उतरत्या संध्याकाळी वाहत्या वाऱ्यावर किनाऱ्याजवळ बसून राहावंसं वाटत होतं. आत्ता नको म्हणून त्याला नकार देऊन मी तशीच बसले किनाऱ्यावर. क्षणभर मनात आलं छानशी गाणी लावावीत... पण मग स्वतःला थांबवलं. निसर्ग भरभरून गप्पा मारत होता.... त्याच्या गप्पा ऐकण्यात जास्त सुख होतं.
अंधार व्हायला लागला आणि मी परत फिरले. परत माझ्या 'होम स्टे' वर आले आणि छानसं साधं खाणं मागवलं. दुपारी माझ्याशी गप्पा मारणारा मुलगा आला आणि म्हणाला;"मॅडम, आपको बिअर मंगता तो है। और भी कूच भी मिलेगा।" त्याचं बोलणं ऐकून हसले आणि म्हणाले तुझ्या या छानशा गावाच्या निसर्गाची नशा मला पुरेशी आहे... त्याहून जास्त नशा नाही लागणार मला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. काहीच नाही घेणार मी हे समजल्यावर. हसत सलाम ठोकत म्हणाला;"मॅडम, आप पहिला है जो कूच भी नही चाहीये बोला। नहीतो इधर आते ही पहिला वोही पुच्छते है।" मी हसले आणि जेवण आटोपून झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी सानापूरचा निसर्ग अजून जवळून पाहावा म्हणून निघाले. कालच्या ज्या वळणावर उजवीकडे वळले होते त्याच वळणावर डावीकडे वळण घेतलं आणि परत एकदा तीच ती नदी समोर होती. थोडं खडकांवर बसले... थोडी इथे तिथे फिरले आणि परत एकदा तीच ती टोपलीची होडी दिसली. मग होडीवाल्याला हात करून त्याच्या होडीत बसले. होडीत त्याच्याशी गप्पा मारायला लागले; तो म्हणाला या करोनाने आमचं कंबरडचं मोडून टाकलं आहे. आमच्याकडे एकपण पेशंट नाही. पण तरीही करोना मात्र आहे. आमचा मूळ व्यवसाय इथे येणाऱ्या देशी-परदेशी लोकांना फिरवणं हाच आहे. पण यावर्षी कोणीही आलं नाही. त्यामुळे खूप त्रास आहे. अशाच गप्पा होत होत्या आणि त्यांनी संगीतलं इथे एक पाचशे वर्ष जुनं माकडाचं मंदिर आहे. मी म्हंटलं अरे मारुती मंदिर म्हणायचं आहे न तुला. तर तो म्हणाला नाही... माकड मंदिरच आहे ते. बरंच उंच आहे. सातशे पायऱ्या असतील. इथे येणारे लोक तिथे नक्की जातात. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कसं जाता येईल याची चौकशी करायला लागले तर म्हणाला तिथे सध्या बिबट्या फिरतो आहे. त्यामुळे बंद केलं आहे मंदिर. 'बिबट्या फिरतो आहे'; ही माहिती त्याने इतक्या सहज दिली जणूकाही बरेच कुत्रे आहेत... म्हणून जाऊ नका असं म्हणतो आहे.
त्याच्या माहितीला गावातल्या इतरांकडून देखील दुजोरा मिळाला म्हणून मग इच्छेविरुद्ध मी मंदिर बघण्याचा कार्यक्रम रद्द केला; आणि तो दिवस सानापूरच्या निसर्गात मनमुराद भटकण्यात घालवला.
सानापूर मधील निसर्गरम्य नदी किनारा.
टोपलीची बोट.
बोटीतील अनुभव.
सानापूर मधील शेतं.
तिसऱ्या दिवशी मी हंपीला जायला निघाले. खरंतर मी हंपीमध्ये एक उत्तम पंच तारांकित हॉटेल ठरवलं होतं. पण माझ्या सानापूरच्या भटकंतीमध्ये मला कळलं की सानापूर ते हंपी जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर आहे. मग हंपीमध्ये राहण्याचा विचार बदलून मी सानापूर ते हंपी प्रवास करायचा ठरवलं. गुगलच्या मदतीने एक रजिस्टर्ड गाईड शोधून त्याच्याशी बोलणं केलं आणि हंपीच्या पहिल्या वळणावर भेटायचं ठरवून माझ्या स्वप्नांच्या दिशेने निघाले.....
त्या कॉरॅकल्सचे वर्णन कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरला भेट दिलेल्या पोर्तुगीज प्रवासी दुमिंगो पाईशच्या वृत्तांतात देखील आले आहे.
पाईश म्हणतो-
टोकऱ्यांसारख्या गोल आकाराच्या नावांतून नदी ओलांडून लोक या शहरात येतात. या नावा आतून वेताच्या व बाहेरून चामडे मढवलेल्या असतात. पंधरा वीस माणसांची वाहतूक त्या एका वेळेला करू शकतात. गरज भासल्यास त्यातून घोडे आणि बैलही नेता येतात. पण बहुतेकदा हे प्राणी पोहत पलीकडे जातात. विशिष्ट वल्ह्यांनी या नावा वलव्हल्या जातात. इतर नावांप्रमाणे या गोलाकार नावा सरळ नाहीत तर वर्तुळाकार फिरत जातात, या राज्यात जेथे जेथे नदी ओलांडावी लागते तेथे याच नावा वापरल्या जातात, दुसऱ्या प्रकारच्या नावा येथे नाहीत.
हंपी तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं एक गाव आहे. खरं सांगू.... हंपीचा उल्लेख गाव म्हणून करताना माझं मन तुटतं आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर परिसरात उभे असलेले महाल, मोठमोठी मंदिरे, स्थापत्याचा अद्भुत नमुना म्हणावा अशा दगडी कमानी, स्नानकुंडे, जिकडे नजर फिरवाल तिथे असंख्य टेकड्यांमधून दिसणारे छोटे छोटे मंडप, मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या एक मजली-दुमजली बाजारपेठा.... इतकं समृद्ध स्थापत्य असलेला भाग हा गाव कसं असेल? पण आपलं दुर्दैव की आता हे फक्त भग्नावस्थेतले ऐतिहासिक स्त्यापत्य सौंदर्य आहे. मात्र प्रत्येकवेळी मनात एकच विचार येतो.... हा आपल्या भारतवर्षातील सुवर्णकाळाचा भव्यदिव्य साक्षात्कार आहे.
इ. स. 1336 ते 1565 मधील विजयनगर म्हणजे बलाढ्य हिंदू साम्राज्य जे महाराज कृष्णदेवराय यांनी सुवर्ण कळसाला पोहोचवलं. मात्र हंपीचा इतिहास हा त्याहूनही मागचा आहे. अगदी त्रेतायुगातील रामायण काळातला. इथे मला एक थोडा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा आहे.
माझा विश्वास आहे की आपण श्री भागवत रामायण ज्याला पौराणिक कथा मानतो आणि त्यामध्ये वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वांना देव किंवा दानव या दोन श्रेणींमध्ये विभागतो ते चूक आहे. रामायण काही पौराणिक कथा नाही.... तो आपला गौरवशाली इतिहास आहे. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे या सत्याला दुजोरा देणारी. अगदी अलीकडंच उदाहरणच सांगायचं तर श्रीराम जन्मभूमी येथील श्रीरामजन्म स्थळ हे खरेच असल्याचे पुरावे आदरणीय कोर्टाने देखील मान्य केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि भारत यामधील रामायण काळात बांधल्या गेलेल्या पुलाचे काही भग्न अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे..... हंपीचा इतिहास हा कृष्णदेवराय यांच्याहूनही मागील काळातला म्हणजे अगदी रामायण काळातला आहे.... हे सत्य आहे.
रामायणातील उल्लेखा प्रमाणे वानरराज सुग्रीव यांची नगरी होती किष्किंधा. जी तुंगभद्रा (त्रेतायुगात या नदीचे नाव पंपा नदी होते) नदीच्या जवळ वसलेली होती. रामायण काळातील ऋष्यमूक पर्वताचा उल्लेख श्रीराम आणि लक्ष्मणाने राहण्यासाठी वापरलेला पर्वत असा आहे. तो पर्वत देखील किष्किंधे जवळ असल्याचा आहे आणि विजयनगर साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक पर्वत होता ज्याचा उल्लेख ऋष्यमूक म्हणूनच केलेला लिखित स्वरूपात आढळतो. त्रेता युगातील पंपा नगरी म्हणून ओळखली ही नगरी पुढे आपभ्रंशीत होऊन हंपी म्हणून ओळखली जायला लागली; अशी देखील मान्यता आहे. तर असं हे आजचं हंपी गाव आणि आपल्या सुवर्ण काळातील एक सर्वांग श्रीमंत शहर पाहण्यासाठी मी निघाले होते.
आपण सुरवात वरती उल्लेख केलेल्या विरुपाक्ष मंदिरापासूनच करूया.
विरुपाक्ष मंदिर हे श्रीमहादेवाचे मंदिर आहे. येथील रहिवासी विरुपाक्ष महादेवांना पांपापति या नावाने देखील उल्लेखताट. या देवालयाच्या स्थापत्य सौंदर्याबद्दल वर्णन करायला मला शब्द कमी पडतील आणि तुम्हाला कधी गेलात तर बघायला वेळ कमी पडेल... इतकं हे देवालय अप्रतिम सुंदर आणि अत्यंत कल्पकतेने वातावरणातील नैसर्गिक बदल आणि त्याचा होणारा स्त्यापत्यावरील परिणाम याचा विचार करून बनवलेले आहे. विरपाक्ष मंदिराच्या दरवाजावरील नक्षीकाम अजोड आहे. आजच्या काळातील कलाकारांचा पूर्ण मान राखत मी म्हणेन की अनेकविध आयुधं उपलब्ध असूनही त्यांना इतकं सुंदर नक्षीकाम जमणार नाही. मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आज जरी ती भग्नावस्थेत असली तरी ते स्थापत्य कृष्णदेवराय महाराजांच्या काळातील वैभव आजही मिरवताना दिसते.
माझ्या गाईडने मला सांगितले की हंपीच्या इतिहासामध्ये या मंदिराचा वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धाराचा उल्लेख आहे. मात्र हे मंदिर नक्की कधी आणि कोणी बांधले याचा ठोस पुरावा नाही. एक अत्यंत महत्वाची बाब ही की भारतावर अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणामध्ये हिंदू मंदिरांचे अतोनात नुकसान करण्यात आले. भग्न मूर्ती, अत्यंत विचारपुर्वक बांधलेले स्थापत्य लयाला गेले. मात्र विरुपाक्ष मंदिराला कधीच हात लागला नाही. त्यामुळे येथील लोकांमध्ये एक मान्यता ही देखील आहे की आपल्या ऐतिहासिक रामायण काळात या जागेवर एक मंदिर उभे राहावे यासाठी काही यज्ञ किंवा बंधन निर्माण केले गेले असेल. मला माझ्या गाईडने अजून एक कारण सांगितले... अर्थात हे कारण स्वीकारणे प्रत्येकाच्या मानसिकतेवर आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे; मुसलमान मूर्ती पूजेच्या विरोधात आहेत आणि विरुपाक्ष मंदिरात शिव पिंडी आहे... मूलतः हिंदू देव हे मानवीय शरीराप्रमाणे असल्याने इतर मंदिरे भग्न पावली. पण शिवाला मानवीय रूप नसल्याने हे मंदिर वाचले. आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत हे मुख्य विजयनगरचे केंद्रस्थान होते. राज्याचा विध्वंस झाला पण हे मंदिर तसेच राहिले. हे पंपातिर्थ स्वामीस्थल म्हणून देखील ओळखतात. पूर्वेकडील गोपुर एकशे पाच फूट म्हणजे जवळ जवळ दहा मजले उंच आहे. मध्ये मोठे प्रांगण असून त्यात अनेक गोपुरे आहेत. संपूर्ण मंदिराभोवती राम, कृष्ण, विष्णू, शिव या अवतारांच्या कथा शिल्प स्वरूपात कोरलेल्या आहेत. प्रत्येक कथा परिपूर्ण आहे. या शिल्प कथा बघताना मला असं वाटलं की राम, कृष्ण, विष्णू आणि शिव यांच्या आयुष्यातील विविध प्राण्यांसंदर्भातील कथा या विशेष करून इथे शिल्पित केल्या आहेत. (अर्थात हे माझं मत झालं.) मंदिराच्या बाजूने खळखळा वाहणारी तुंगभद्रा नदी आहे आणि नदीकडे उतरणारे अनेक घाट देखील आहेत. या ह नदीचे पाणी दगडी पन्हाळींमधून मंदिराच्या प्रांगणात खेळवले आहे आई वरून या पन्हाळीं दगडांनी बंदिस्त केलेल्या आहेत. स्वच्छ आणि शुद्ध पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक अशी उत्तम सोय आहे इथे. मंदिर अति प्राचीन आहे यात शंकाच नाही. मात्र कृष्णदेवरायाने आपल्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ या देवळाचा रंगमंडप बनवला आहे.
विरुपाक्ष मंदिरासंदर्भात अजून एक कथा प्रचलित आहे. दक्ष यज्ञामधील सती देवींच्या दहना नंतर भगवान शंकर कैलास सोडून हेमकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन राहिले. तिथे पंपा देवी (पार्वती) भगवान शंकराची प्रेमभावनेने सेवा करीत होती. मात्र उग्र तापश्चर्येत मग्न श्रीशंकरांचे मन विचलित होत नव्हते. त्याचवेळी राक्षसांच्या सततच्या आक्रमाणांमुळे इंद्रादि देव त्रस्त झाले होते. त्यावेळी ब्राम्हदेवांनी दूरदृष्टीने जाणले की राक्षसांचा संहार केवळ शिवकुमारच करू शकतो. मात्र तपस्येत लीन श्रीशंकरांना जागे करणे अशक्य होते. त्यामुळे मन्मथाला पाचारण करण्यात आले. पंपादेवी श्रीशंकरची पूजा करण्यास नेहेमीप्रमाणे आली असता मन्मथाने पुष्पतीर सोडून श्रीशंकरांची तपस्या भंग केली. क्रोधीत श्रीशंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मन्मथाला भस्म केले. मात्र त्यानंतर त्यांचे लक्ष देवी पंपा (पार्वती) कडे गेले आणि यथावकाश शिवकुमार (कुमार स्वामी) यांचा जन्म झाला आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. मात्र मन्मथ पत्नी मन्मथाच्या मृत्यूने शोकाकुल झाली आणि जीव देण्यास निघाली. त्यावेळी तिला पंपादेवींनी थांबवले आणि श्रीशंकरांना संकडे घातले. त्यावेळी श्रीशंकरांनी मन्मथाला उ:शाप दिला. मात्र त्याला त्यानंतरचे जीवन बिना रूपाचे व्यतीत करावे लागले. बिनारूपाचा उ:शाप दिल्याने श्रीशंकरांना विरुपाक्ष हे नामाभिधान पडले आणि त्याचवेळी पंपादेवींचे पति म्हणून पंपापती देखील म्हंटले जाते.
१
२
३
४
५
६
७
८
९
विरुपाक्ष मंदिर बघून मी पुढे निघाले. कोदंडधारी रामाचे मंदिर देखील असेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी असल्याचे मी वाचले होते. त्यामुळे ते बघण्याची मला खूप उत्सुकता होती. (थोडं विषयांतर होईल खरं पण... 'कोदंडधारी राम' हा उल्लेख झाला आणि पु. ल. देशपांडेंची सहकुटुंब सहपरिवार पार्ले भेट आठवते नाही.) त्यावेळी तुंगभद्रा नदीच्या तिरावरून लहान-मोठे चढ उतार पार करून पुढे जात होते. शेजारून वाहणारी भद्रा नदी मला प्रेमाने खुणावत होती. 'मंदिर बघशीलच ग.... थोडं माझ्याजवळ येऊन बस् तरी.' असं तर सुचवत नव्हती न ती? शेवटी मोह न आवरून तिचं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारत मी तिच्याशी हितगुज करत बसले होते. तो शांत परिसर आणि तिचं ते खळाळत वाहाणं... निसर्गाच्या ओंजळीत हरवल्यासारखं वाटत होतं मला. बराचवेळ असंच रमल्या नंतर रामदर्शन घेण्यासाठी मी निघाले. अप्रतिम सुंदर राम, लक्ष्मण आणि सीतेची काळ्या दगडातील किमान दहा फुटी मूर्ती मन प्रसन्न करत होत्या. रामाच्या हातातील कोदंड (धनुष्य) सुंदर बांक असलेलं होतं. पूजा करणाऱ्या गुरुजींशी सहज गप्पा मारायला लागले आणि आश्चर्य म्हणजे मी महाराष्ट्रातुन आले आहे आणि मराठी आहे हे कळल्यावर ते उत्तम मराठी बोलायला लागले. अनेक वर्ष मुंबईमध्ये ते नोकरी करत होते. पण मूळचे हंपी सारख्या निसर्गरम्य ठिकाणचे असल्याने त्यांचे मन मुंबईमध्ये रमले नाही आणि काही वर्षातच परत हंपीमध्ये येऊन ते पूर्वापार चालत आलेल्या कोदंडधारी रामाच्या सेवेत रुजू झाले; असे म्हणाले.
१०
कोदंडधारी राममंदिर बघून पुढे निघाले ते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी. कदाचित माझा हा लेख वाचायला सुरवात करतानाच तुम्ही या मंदिराचे वर्णन अपेक्षित केले असेल. कारण हंपी म्हंटलं की कोणार्कच्या सुर्यमंदिराच्या धर्तीवर भव्य कोरीवकाम केलेल्या जगप्रसिद्ध दगडी रथाचे फोटो आणि वर्णन सर्वात प्रथम अपेक्षित असते. विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजा कृष्णदेवरयांनी स्वतःच्या दिग्विजया प्रित्यर्थ हे मंदिर बनवले आहे. असंख्य कोनांनी नटवलेला मुख्य चौथरा हा अजस्त्र कोरीव शिलांनी बनवलेला आहे. आता या चौथऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मात्र माझ्या गाईडने दिलेल्या माहिती प्रमाणे या चौथऱ्यावरील जे स्तंभ आहेत ते अत्यंत मजबूत आणि दगडांचे असले तरी त्यातून ह्रिदम निर्माण होते. म्हणजे जर एका ठराविक पद्धतीने या खांबांवरून आपण बोटं फिरवली तर नाद निर्माण होतो. पूर्वी मंदिरामध्ये ज्यावेळी मोठे मोठे समारंभ, विवाह, उत्सव होत असत त्यावेळी या स्तंभांचा उपयोग वाद्य म्हणून केला जाई. या स्तंभांवर प्राणी, पक्षी यांचे कोरीव काम आहे. तर मंदिराच्या भिंतींवर विविध देवतांची शिल्पे आहेत. मंदिरासमोरील जगप्रसिद्ध दगडी रथ म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवणारे वास्तुशिल्प आहे. अनेक दगडीणी रचनात्मक रीतीने साधलेला आणि अप्रतिम कोरीव नक्षकाम केलेला, दगडी चाके असणारा आणि पुढील बाजूस दोन दगडी हत्ती असणारा हा रथ एकेकाळी चालवत असत. या रथाच्या मध्यभागी दगडी सोपान आहे आणि चाकांमध्ये आरीचा दांडा आहे. या रथाचे विशेष म्हणजे रथावरील सैनिकांचे शिल्प आहेत त्याचे चेहेरे अरब, पर्शियन किंवा पौर्तुगीज लोकांशी मिळते-जुळते आहेत.
माझ्या गाईडने सांगितले की तुम्ही जर प्रत्येक मंदिर किंवा राजाच्या राजवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे स्थापत्य बघितलेत तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे विविध चेहेरे दिसतील. त्याच्या म्हणण्यानुसार विजयनगर भारतवर्षातील सर्वात श्रीमंत शहर होते. राजा कृष्णदेवराय अत्यंत कलासक्त आणि आगत्यशील होता. त्यामुळे दूरदूर देशातील (किंबहुना असं म्हणू की सर्वदूर पसरलेल्या भारतवर्षातील) लोक आपल्या वस्तू, कला-कौशल्य घेऊन राजाश्रयाच्या आशेने इथे येत असत; आणि त्यांची ही आशा राजा कृष्णदेवराय पूर्ण करत असे.
कदाचित असं देखील असेल की महाराज कृष्णदेवराय यांच्या कलाप्रेमाविषयी समजल्यानंतर अनेक कलाप्रेमी विद्यार्थी शिल्पकला शिकण्यासाठी विजयनगरीमध्ये दाखल झाले असतील; आणि शिक्षणादरम्यान शिल्पकलेतील कथा तर रामायण, महाभारतातील घेतल्या असतील आणि स्वतःची ओळख सांगण्यासाठी (special signature establishment) चेहेरे मात्र आपल्या देशातील जडणघडणी प्रमाणे निर्माण केले असतील.
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
हंपी मधील हमखास बघावे अशी एक खास गणपतीची मूर्ती आहे. कडलेकलू या नावाने ओळखली जाणारी ही गणेश मूर्ती एका उंच गर्भगृहात स्थापित असुन ती अखंड कातळात कोरलेली आहे. गर्भागृहासमोर रंगमंडप असून तो उंच स्थभांनी तोललेला आहे.
२२
२३
पुढील शिल्प म्हणजे बडवी शिवलिंग. अखंड काळ्या पाषाणात कोरलेले एक भव्य शिवलिंग आहे हे. याचे गर्भगृह अत्यंत साधे असून याला वर छत देखील नाही. शिवलिंगाचा तळ सतत पाण्यात असतो.
२४
२५
लक्ष्मी नरसिंव्ह ही 6.7 मित्र उंच सर्वात भव्य मूर्ती असावी हंपीमधील. या मूर्तीची निर्मिती एका ब्राम्हणाद्वारे केली गेली असे मानले जाते. मात्र आर्य कृष्णभट्ट यांच्या शुभहस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असे मानले जाते. या मूर्तीचे विशेष म्हणजे नरसिंव्ह मूर्ती असूनही त्यांच्या उजव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असल्याचे शिल्प होते. मात्र ही लक्ष्मी मूर्ती खंडित झाली आहे. आता केवळ लक्ष्मीचा डावा हात उरला आहे जो अत्यंत मनोहरपणे भगवान नरसिंव्हांच्या कमरेला धरलेला आहे.
२६
२७
यापुढच्या हंपी वर्णनाच्या अगोदर थोडा श्वास घेऊया का? मला माहीत आहे; तुम्हाला वाटतंय की ज्याप्रमाणे मी एकामागून एक वर्णन करत सुटले आहे त्यावरून संपूर्ण हंपी मी एका दमात आणि एका दिवसात बघितलं आहे. पण तसं नाही हं. निसर्गात आणि अप्रतिम शिल्पकला आणि स्त्यापत्य कला यात रमत मी एकूण पाच दिवस फिरले हंपीमध्ये. तसं तीन दिवस पुरेसे असतात. पण मला सगळंच मनापासून बघायचं आणि त्याहूनही जास्त अनुभवायचं होतं. त्यामुळे मी मुद्दाम दोन दिवस जास्त राहिले. अर्थात प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे दिवस ठरवावेत असं मला वाटतं. या हंपी वर्णनातला एक खास वेगळा अनुभव आहे. पण तो वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात तर जास्त मजा येईल.
महानवमी डिब्बा ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे. हिचा आकार चौकोनी असून तळ प्रचंड मोठा असून हळूहळू तो लहान होत जातो. राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ ही वेदी उभारली गेली होती. या वेदीच्या चारही बाजुंनी शिल्पपट कोरलेले आहेत. यामध्ये स्त्रिया शिकार करताना, युद्धकला शिकत आहेत अशी शिल्प देखील आहेत. याचा अर्थ असा होतो की महाराज केवळ कलासक्त, हुशार, उत्तम स्त्यापत्यकार नव्हते; तर स्त्रीसन्मान कसा केला जावा आणि त्यासाठी स्त्रियांना देखील बरोबरीची वागणूक मिळावी हा विचार त्यांच्या राज्यात केला जात होता असे दिसते. या शिल्पांमध्ये होळीचे, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग शिल्पित केले आहे. एकेठिकाणी डोक्यावर पर्शियन टोपी घातलेली आणि लहान दाढी असलेली व्यक्ती शिल्पित आहे. या व्यक्तीला हत्ती नमस्कार करतो आहे असे शिल्पित आहे. कदाचित त्याकाळात महाराज कृष्णदेवराय यांना दूरदूरहुन इतर राजे देखील भेटायला येत असतील आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जात असेल. याच प्रसंगाला शिल्पित केले गेले असेल.
२८
२९
३०
३१
३२
स्थापत्य सौंदर्याने नटलेल्या हंपीमधील काळ्या दगडाची पुष्कर्णी अत्यंत खास आहे. अलीकडे लग्नाच्या अगोदर मुलगा-मुलगी विविध ठिकाणी जाऊन सुंदर फोटो काढतात. ज्याच्या-त्याच्या हौसे प्रमाणे आणि आर्थिक सोयीनुसार ही ठिकाणं ठरतात. या prewedding shoots मधील अगदी खास ठिकाण म्हणजे ही पुष्कर्णी. काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्या-पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे हिची. अनेक वर्षे मातीच्या टेकडीखाली दबली गेलेली ही पुष्कर्णी अप्रतिम सुंदर आहे. पूर्व काळापासून एका दगडी पन्हाळीतून या पुष्कर्णी मध्ये पाणी खेळवले गेले आहे. माझा गाईड संगत होता की ही पुष्कर्णी शोधताना जे कामगार होते त्यात तो देखील होता... अर्थात त्यावेळी तो खूपच लहान होता. मात्र नाजूक ब्रश आणि जमिनीवर जवळ-जवळ सरपटत जाऊन एक एक भाग मोकळा करावा लगत असे. प्रत्येक फुट स्वच्छ केल्यानंतर तिथे असणाऱ्या वास्तू संशोधकांपैकी कोणाला तरी बोलावून झालेले काम दाखवावे लागायचे. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातील भाव सांगत होते की तो परत एकदा लहान होऊन सरपटत ती पुष्कर्णी शोधत होता.
या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक मंदिर आहे. या पुष्कर्णीची कथा अशी आहे की राज घराण्यातील स्त्रियांनी या पुष्कर्णीमध्ये पाय धुवून मगच या मंदिरातील देवीच्या दर्शनाला रोज जाणे अपेक्षित होते.
३३
३४
महानवमी डिब्बा, पुष्कर्णी यानंतर राज परिवारातील स्त्रियांसाठी बनवलेला कमल महाल ही देखील एक सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. लोटस महाल असा याचा उल्लेख अलीकडे केला जातो. या स्थापत्यामध्ये मुसलमानी शैलीचा काहीसा भास होतो. या तीन मजली इमारतीमध्ये जाण्यासाठी आतल्या बाजूस जिने आहेत. पण आता ते बंद करून टाकले आहेत. कड उन्हात देखील या महालात थंड हवा खेळती असते. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ही थंड हवा खेळती राहण्यासाठी हवेच्या दाबावर पाणी या महालाच्या सर्वात वरील टोकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे. हे पाणी वरून महालाच्या चोहीकडून कारंज्याप्रमाणे खाली येते. त्यामूळे भर उन्हाळ्यात देखील पाऊस पडत असल्याप्रमाणे हा महाल पाण्यात भिजत असतो. कौतुकास्पद स्थापत्य हे की खाली पडणारे पाणीचं नाल्यामधून एका बाजूस एकत्र करून परत वर चढवले जाते. खरंच मानत येतं त्या काळातील भारतीय स्थापत्यकार आजच्या मानाने कितीतरी पुढचा विचार करणारे होते.
३५
३६
क्रमशः
विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे. ऐंशी फूट लांब आणि किमान पस्तीस/चाळीस फूट रुंद असा हा तरण तलाव आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना बसण्याची सोय आहे. बहुतेक स्वतः महाराज कृष्णदेवराय देखील या तरण तलावात होणाऱ्या स्पर्धांना भेट देत असावेत. कारण या तरण तलावाच्या एका बाजूला दगडी घुमत असलेली मेघडंबरी आहे. एका नजरेत न मावणारा विस्तार आहे या तलावाचा.
१. तरण तलाव
२. तरण तलावाची माहाराज बसत असलेली बाजू.
३. तरण तलावाजवळील मेघडंबरी.
तरण तलावाच्या एका बाजूला पुष्कर्णी आहे आणि त्याच्या पुढेच माहाराजांच्या नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा येतो. (हे इतकं मोठं वाक्य लिहिताना या राजदरबारासाठी एक उल्लेख मनात आला. 'दीवणे-आम'. पण मग मनात आलं हा काही आपल्या शब्दकोशातील शब्द नाही. मग थोडं मोठं वाक्य होईल... पण नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा.... असं म्हणणंच जास्त योग्य होईल! असो!) माझ्या गाईडने मला सांगितलं की महाराज कृष्णदेवराय ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी म्हणून खास दरबार भरवायचे. यावेळी माहाराज एका उच्चासनावार बसत असत. त्यामागे दोन कारणं होती... अर्थात पहिलं कारण माहाराजांची सुरक्षा हे होतं आणि दुसरं कारण ऐकून माझा कृष्णदेवराय माहाराजांबद्दलचा मनातील आदर खूपच वाढला. ते कारण म्हणजे.... या उच्चसनावरून माहाराजांना समजू शकत असे की नक्की किती लोक त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामूळे दारवान किंवा शिपाई किंवा कोणी अधिकारी जर कोणा नागरिकाला थांबवत असेल तर ते महाराजांना दिसत असे आणि ते असं होऊ देत नसत. किती वेगळा विचार करणारा राजा होता तो.... 'जेव्हा मी माझ्या रयतेचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी वेळ काढीन त्यावेळी सर्वांचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत मी तिथे उपस्थित राहीन.' कदाचित म्हणूनच अगदी नेपाळ-भूतान पर्यंत महाराज कृष्णदेवरायांनी युद्ध मजल मारली आणि त्यांच्या सोबत त्यांचं सैन्य कायम राहिलं.
४. महाराजांचे उच्चसन.
५. माहाराजांच्या नागरिकांना भेटण्यासाठी असलेल्या उच्चसनावरून दिसणारा संपूर्ण भाग. इथून होळी समारंभासाठी बांधलेला चौथरा देखील दिसतो आहे.
६.
पुढच्या एका अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद भुयाराबद्दल सांगण्या अगोदर एक खूपच महत्वाच्या स्थापत्य निर्माणाबद्दल सांगण आवश्यक आहे. त्याकाळातील स्थापत्य विशारदांचं कौतुक करू तितकं कमीच. किंबहुना मी तर म्हणेन की आपली लायकीच नाही त्या अत्यंत विचारी आणि समयोचित नियोजन करण्याचं सामर्थ्य असलेल्या लोकांचं कौतुक करण्याची. त्यांनी निर्माण केलेले स्थापत्य आपण बघावं आणि तोंडात बोट घालून गप बसावं इतकंच काय ते आपलं कर्तृत्व असू शकतं. तर...
महाराज कृष्णदेवराय यांचा राज परिवार सामावणारा परिसर अत्यंत मोठा आणि दूरवर पसरलेला आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. या अतिप्रचंड भागामध्ये राज परिवार आणि त्यासोबत त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सर्वांसाठी विविध सोयी तर केल्या तरी सर्वात महत्वाची आणि अत्यावश्यक सोय म्हणजे पाणी. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे दगडी चर संपूर्ण परिसरात फिरवलेले आहेत. तरण तलावात पडणारे पाणी असो किंवा पुष्कर्णीमध्ये जाणारे पाणी असो... महाराजांच्या राज महालाचे आता फार अवशेष उरले नसले तरीही त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे कालवे अजूनही शाबूत आहेत. खरंच हे निर्माण करणं फारच अवघड आहे. या पाणीपुरवठयाचा विचार किती खोलवर केला असेल हे देखील समजून घेण्यात मजा आहे. माहाराजांच्या राजपरिवरासाठी निवडण्यात आलेल्या जागेच्या थोड्या दुरावरून नदी वाहाते. नदीच्या पात्राच्या उताराचा अभ्यास करून पाण्याच्या दबाव तंत्राचा वापर करून राजपरिवर जागेपासून काही अंतरावर दोन तलाव बांधण्यात आले आहेत. हे तलाव दगडाचे असले तरी यामध्ये नैसर्गिक झरे येऊन मिळतात. या तलावांपासून एक मोठा कालवा तयार करून तो राजपरिवार जागेपर्यंत आणण्यात आला आहे. संपूर्ण जागेवरून हा कालवा फिरवल्या नंतर त्याचा उतार एका अशा बाजूला निर्माण केला आहे की जिथे त्याकाळात राज परिवाराव्यतिरिक्तच्या लोकांसाठी अन्न शिजवलं जात असे. (माहाराज कृष्णदेवराय यांना भेटण्यासाठी अनेक राजे-माहाराज येत असत. त्यांच्या सोबत त्यांचा लावाजमा असे. त्यांच्यासाठी अन्न बनवले जात असे ती जागा). तिथून हा कालवा अजून पुढे देखील जातो आणि मग हळू हळू जमिनीला समांतर जात अजून एका मानव निर्मित तलावात त्याचे पाणी सोडलेले आढळते. जिथे तो कालवा जमिनीला समांतर जातो त्याच्या दोन्ही बाजुंनी दगडात कोरलेली जेवायची ताटं आहेत. काही केळीच्या पानांच्या आकाराची तर काही नुसती आयताकृती. वट्यांसाठीचे खड्डे देखील आहेत त्यात. या ताटांमधून देखील नादनिर्मिती होते.
७. दगडात कोरलेली नादमययी ताटे आणि वाट्या.
पुढचा विडिओ नक्की बघा हं. एका कृत्रिम तलावाखाली तयार केलेली खोली आहे. सहज बघितलं तर राज परिवारासाठी तयार केलेला पाण्याचा साठा. मात्र खाली एक महत्वाच्या व्यक्तींसोबत खलबतं करण्याची खोली. यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे वरती पाणी असल्याने खालील चर्चा इच्छा असूनही कोणालाही ऐकायला येणे शक्य नाही. (हा खलबतखाना बघताना मला शिवरायांची आठवण झाली. अनेक गड आणि किल्ले बघितले आहेत मी आजवर. त्यापैकीच कोणत्यशा गडावर शिवाजी माहाराजांनी देखील असाच काहीसा खलबतखाना तयार करून घेतला होता; तो बघितल्याचं आठवत मला. पण कोणता किल्ला आणि कधी बघितलं आहे ते मात्र आता आठवत नाही. अर्थात इथे एक इंग्रजी म्हण चपखल बसते असं वाटतं... All great people think alike.)
या चोर खोलीच्या पुढेच महाराज कृष्णदेवराय यांचा कला दरबार भरत असे. इथे एक मोठा चौथरा आहे. चार फूट उंच असा. याच्या चारही बाजूंनी बसता येईल अशी सोय असल्याचं दिसतं. चारही बाजूनी या चौथऱ्यावर चढता येतं. या जिन्यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती आहेत आणि या हत्तींच्या कानांना भोकं आहेत. त्याशिवाय चौथऱ्याच्या प्रत्येक कोणाकडे देखील भोक आहे. माझा गाईड सांगत होता की या चौथऱ्याच्या मध्यावर एक सुंदर रंगीत तलम कापडांनी सजवलेला प्रचंड उंच बांबू उभारला जायचा. त्या कापडांची दुसरी टोकं या हत्ती आणि इतर चार कोनांमधील भोकांमधून घालून एक सुंदर आणि वेगळी सजावट केली जात असे. या चौथऱ्यावर कला प्रदर्शन करण्यासाठी परदेशातून नामवंत कलाकार येत असत. त्याशिवाय महाराज कृष्णदेवराय यांच्या पदरी देखील अनेक अलौकिक नृत्यांगना होत्या. यांची कला देखील या चौथऱ्यावर प्रदर्शित होत असे. राजा कृष्णदेवराय यांचे वेगळेपण असे की ज्याप्रमाणे राज परिवारासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी असे कार्यक्रम आयोजित होत; त्याचप्रमाणे आम जनतेसाठी देखील असे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम होत असत. त्यात देखील अजून एक वेगळी बाजू म्हणजे जर महाराजांच्या जनतेमधून आयत्यावेळी कोणी पुढे येऊन स्वतःची कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली तर माहाराज ही इच्छा देखील पूर्ण करत असत.
८.
चौथऱ्याच्या बाजूच्या भोकांचा विडिओ.
दंडनायकाचा बुरुज नावाचा एक बुरुज आहे कमल महालाजवळ. अशी वदंता आहे की कृष्णदेवराय माहाराज स्वारीवर जात असत त्यावेळी त्यांचा स्त्रीपरिवर या कमल महाल आणि परिसरात राहायला येत असे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा दंडनायकाचा बुरुज बांधलेला होता. केवळ या बुरुजावर काही पुरुष पाहरेकरी ठेवले जात. बाक आतील बाजूस केवळ महिला पाहारेकरी आणि दासी असत.
९. दंडनायकाचा बुरुज.
कृष्णदेवराय माहाराजांची गजशाला खरच पाहण्यासारखी आहे. माहाराजांच्या प्रमुख अकरा हत्तींना राहण्यासाठी बनवलेली ही गजशाला अजूनही अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत आहे. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आतून लहान दरवाजे देखील आहेत. प्रत्येक दळणाला वर गोल घुमट आहे आणि घुमटाखाली लोखानदी हुक आहे. यांच्या आधारे दोरखंडांनी हत्तींना बांधून ठेवत असत. गजशालेच्या एका बाजूला अजून एक इमारत दिसते. ती देखील अजूनही उत्तम स्थितीत आहे. मात्र आता लोखंडी गेट्स बसवून ती बंद केली आहे. इथे पाहारेकरी आणि माहुतांचे वसतिस्थान असावे.
१०. सुस्थितीत असलेली गजशाला.
११. माहुतांचे निवासस्थान
१२. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना मध्ये लहान दरवाजे आहेत.
राजा कृष्णदेवराय यांच्या राज परिवारासाठी तयार केलेला परिसर वरील फोटोंमधून आपल्याला दिसलाच असेल. या हजारो एकरांवर पसरलेल्या महाराजांच्या राहण्याच्या जागेबरोबरच; विविध सण-समारंभ किंवा कला प्रदर्शनासाठी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या चोहोबाजूंनी एक कणखर तटबंदी होती. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. मात्र या तटबंदीच्या मधोमध एका अखंड शिळेतून बनवलेला दरवाजा मात्र अजूनही एका बाजूस ठेवलेला दिसतो. कदाचित फोटोमधून त्या अजस्त्र दरवाजाचा अंदाज पूर्ण येणार नाही. पण थोडी तरी कल्पना करू शकाल तुम्ही म्हणून हा फोटो देखील इथे देते आहे.
१३.
१४.
१५.
पुरातन काळातील स्थापत्य शैलीचं कौतुक करावं तितकं कमीच म्हणता येईल. महाराज कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राजकुळातील स्त्रियांसाठी विविध वैशिष्ट्यांनी सजवलेले स्नानगृह देखील निर्माण करवले होते. या स्नानगृहाला वरून गोपुराचा आकार दिला गेला आहे. मध्यभागी तलाव निर्माण करून त्यात दगडी पन्हाळीमधून पाणी सोडण्याची सोय केली आहे. कौतुकाचा भाग हा की या तलावातील वापरलेले पाणी वेगळ्या पन्हाळीमधून बाहेर काढून ते सभोवतालच्या बगीचाला पुरवले जाईल अशाप्रकारे सोय केली आहे. कितीतरी खोल विचार केला आहे हे स्नानगृह बांधताना. स्नानगृहातील तलावाच्या चारही बाजूनी व्हरांडा आहे आणि त्याला तलावाच्या बाजूने झरोके देखील केले आहेत. कोपऱ्यांमधून स्नानगृहाच्या वरील गच्ची सदृश भागात जाण्यासाठी जिने आहेत. परंतु ते आता बंद करून टाकले आहेत. माझ्या गाईडने सांगितले की लहानपणी इथे सर्व मुलं लपाछपी खेळण्यास येत असत. कधीतरी पुढे वास्तुशास्त्र तज्ञ आले आणि मग लहान मुलांसाठी खेळण्याची एक जागा बंद झाली.
१६.
१७.
१८.
हंपीमध्ये आलात आणि सूर्योदयाचं नयनमनोहर दृष्य बघितलं नाहीत असं नक्की करू नका. हजारराम मंदिराच्या जवळच लहानशी टेकटी आहे. तिथे थोडं चढून गेलं की दगडी कुटी आहे. कदाचित पूर्वकाळातील साधू-संतांच्या राहण्यासाठी आणि तपश्चर्येसाठी तयार केलेल्या त्या परिसरातील अनेक कुटींमधली ही कुटी असावी. तर अगदी अंधार असताना या कुटीच्याही वर चढून जाऊन बसावं लागतं. एक लांबलचक वाट बघण्याची वेळ... पण मग ते लवकर उठणं, ते धडपडत वरपर्यंत चढून जाणं आणि ते वाट बघणं खरंच फळतं.... केशररंग घेऊन सामोरा येणाऱ्या आदिनारायणाचं ते शुचिर्भूत दर्शन पुढचे अनेक दिवस मन प्रसन्न ठेवायला पुरेसं ठरतं.
१९.
२०.
दिनकराला वंदन करून खाली उतराल तर समोरच हजारराम मंदिर म्हणून ओळखलं जाणारं रामाचं मंदिर दिसतं. या मंदिराचं विशेष म्हणजे असं मानतात की रावणाने सितामातेचे हरण केल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण सितामातेला शोधायला निघाले त्यावेळी त्यांनी याठिकाणी काहीकाळ विश्रांती घेतली होती. मंदिराच्या आवारामध्ये एक प्रचंड मोठा सभामंडप आहे. या सभामंडपाचं विशेष म्हणजे या सभांमंडपामध्ये कोरलेली शिल्पे ही रामायण काळातील कथांवर आधारित असली तरी या शिल्पांचे चेहेरे प्रचंड भिन्न आहेत. काही चेहेरे हे नेपाळ-भूतान येथील लोकांसारखे आहेत; तर काहींचे चेहेरे लांबाकृती आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक कुटी असल्याचं मी म्हंटलंच आहे. मला वाटतं कदाचित या मंदिरामध्ये शिल्पकला शिकण्यासाठी येणारे दूरदेशीचे विद्यार्थी राहात असतील. आपल्या शिक्षकांनी शिकवलेली विद्या येथील सभामंडपातील खांबांवर ते कोरत असतील. मात्र आपल्या देशाची किंवा जेथून आलो तिथली ओळख या ठिकाणी राहावी या उद्देशाने कथा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कोरली तरी त्यातील चेहेरेपट्टी आपल्या देशाची निर्माण करत असतील.
२१.
२२.
कर्नाटकातलं हे हंपी म्हणजेच राजा कृष्णदेवराय यांचं विजयनगर किंवा रामायण काळातील किष्किंदा नगरी म्हणजे निसर्ग आणि पुरातन स्थापत्याने नटलेलं गाव/शहर. तुम्ही जितकं फिराल तितकं कमीच. आपापल्या आवडीनुसार किती दिवस जायचं ते प्रत्येकाने ठरवावं. माझ्याबद्दल सांगायचं तर सानापूर मधल्या home stay मध्ये काहीही न करता मी आठवडाभर राहूच शकते. रोज उठून नदीवर जायचं आणि खळाळत पाणी बघत राहायचं. जमलंच तर गावातल्या पोरांबरोबर मासे पकडायचे. दहा मिनिटात फिरून संपणाऱ्या गावात फिरायचं.... आणि मग पुरातन वारसा लाभलेलं जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारं हंपी बघायला निघायचं. अर्थात या संपूर्ण वर्णनामध्ये इथल्या कर्नाटकी जेवणाचा उल्लेख मी केला नाही... तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी न खाता-पिता फिरत होते. असं मुळीच नाही हं. इथले लोक खाण्याच्या बाबतीत प्रचंड हौशी आहेत. विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक अत्यंत स्वच्छ आणि सुंदर खानावळ आहे. तिथलं जेवण अप्रतिम आहे. एकदम कर्नाटकी पध्दतीचं. मी माझ्या गाईडला आग्रहपूर्वक सांगितलं होतं की मला रोज इथल्या सर्वसाधारण ढाब्यावर जाऊन जेवायचं आहे. दोन वेळा तर आम्ही एकशे पंचवीस रुपये प्रत्येकी भरून बुफेमध्ये जेवलो. भरपूर भात... मग तो एकदा सांबार बरोबर, एकदा रस्सम बरोबर, मग भाजी बरोबर आणि शेवटी दही-दुधाबरोबर खायचा असतो. गोड म्हणून इथे खीर देतात. इथली थंड पेय देखील अगदी खास... एक तर ताक; साधं किंवा मसाला घातलेलं. दुसरं पोटासाठी अत्यंत उत्तम असं पुदीना सरबत. इथले ढाबे अत्यंत स्वच्छ आणि भारतीय बैठकी असलेले आहेत. अर्थात ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल-खुर्ची अशी सोय देखील आहेच.
२३. विरुपाक्ष मंदिराजवळील ढाबा.
२४. मँगो ढाब्यामधील टेबल खुर्ची बैठक.
२५. मँगो ढाब्यामधील भारतीय बैठक
२६. कर्नाटकी शाकाहारी जेवण. विरुपाक्ष मंदिर जवळ असल्याने इथे मांसाहार वर्ज आहे. मात्र थाळी unlimited
२७. गावातील ढाबा भारतीय बैठक.
२८. थाळी.
हंपी बद्दल इथे मी जरी लिहिलं असलं तरी हंपी पाहणं हा एक खरंच अनुभव आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तो अनुभव एकट्याने घेण्यात खरी मजा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जरी थोडा जास्त वेळ थांबलात तरी चल-चल म्हणून कटकट करणारं कोणी नसतं. माझं मत विचाराल तर हंपीमधला निसर्ग फक्त डोळ्यात नाही तर मनात साठवून घ्या. इतक्या सहज नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसता येण्याचं सुख आता भारतात फारसं उरलं नाही. एकतर भडभुंजे मागे लागतात नाहीतर काही न काही विकायला येणारे लोक असतात. तुंगभद्रेचा किनारा अजूनही अशा दृष्टीकोनातून अस्पर्श आहे. इथे अजूनही शांतता आणि पक्षांची किलबिल आहे. एक अजून अनाहूत सल्ला. इथल्या नदीकिनारी बसताना कोणतंही गाणं नका हं लावू... मला देखील आशा-किशोर-लता-मन्ना डे आणि सगळेच जवळ घेऊन बसावंस वाटलं होतं पहिल्या दिवशी. पण मग लक्षात आलं की मी गाण्याच्या शब्दांमध्ये हरवते आहे.... समोर पसरलेल्या या प्राकृतात नाही.... आणि मग फक्त आणि फक्त हंपी जगायचं ठरवून फिरायला बाहेर पडले.
तो मोठा इतिहास आहे. दक्षिण भारतात त्यावेळी दिल्लीच्या सुलतानांचे राज्य होते, शिवाय येथे त्यांचे मांडलिक पण होते. तुघलकाने कांपिलीच्या राजाचा पराभव करुन तिथे मुसलमानी राज्याची स्थापना केली. हरिहर व बुक्कराय हे याच कांपिलीच्या राजाचे किंवा होयसळांचे सरदार होते असे म्हणतात. स्वामी विद्यारण्यांच्या प्रेरणेने हिंदू धर्माची रक्षा करण्याच्या हेतूने हरिहर आणि बुक्काने १३३६ साली विजयनगरच्या स्वतंत्र राजवटीची स्थापना केली. बुक्काने मदुराईच्या सुलतानाचा पराबव करुन तो भागही आपल्या साम्राज्याला जोडला. ह्याच सुमारास दिल्लीच्या सुलतानांपासून फुटून हसन गंगू बहमनीने बहमनी राजवटीची स्थापना १३४७ साली केली. तुंगभद्रा आणि कृष्णेच्या मधील प्रदेशांतील वर्चस्वासाठी ह्या दोन राजवटीत सतत लढाया होत असत. ह्याच दरम्यान बुक्करायाचे वंशजांनी विजयनगरचा अंमल गोवे, मदुराई, इतर दक्षिण भारत येथे प्रस्थापित केला. पुढे तुळुव घराण्याचा विजयनगरच्या पराक्रमी सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दित विजयनगरचा प्रचंड विस्तार झाला तो असा पूर्वेकडे ओरिसा, पश्चिमेकडे भटकळ-होनावर, उत्तरेकडे रायचूर आणि मुद्धल आणि दक्षिणेत थेट दक्षिण समुद्रापर्यंत. विजयनगरच्या राजांबरोबरच्या सततच्या लढायांमुळे आणि बहमनी राजवटीतील अंतर्विरोधामुळे त्या राजवटीची १४२५ मध्ये शकले होउन निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बेरीदशाही ह्या पाच स्वतंत्र शाह्या दख्खनमधे निर्माण झाल्या. विजयनगरच्या तुलनेत साहजिकच त्यांचे सामर्थ्य कमीच होते. खुद्द कृष्णदेवरायाने रायचूर जिंकून विजापुरच्या वेशीवर धडक देऊन आदिलशाहा शरण आणले होते. कृष्णदेवरायाच्या मृत्युनंतर विजयनगरचे सामर्थ्य कमजोर होत गेले. घराण्याची सत्ता अच्युतरायानंतर जावई(अलिया) रामरायाकडे गेली (अराविडू घराणे). रामराया पाच शाह्यांमधल्या भांडणाचा फायदा घेत कधी इकडे तर कधी तिकडे असा मदत करुन ह्या शाह्यांना एकमेकांशी लढवत ठेवून त्यांना झुलवू लागला. विजयनगरची संपत्ती व वैभव बघून ह्या पाच शाह्या १५६५ मध्ये एकत्र आल्या आणि तालिकोटची सुप्रसिद्ध लढाई झाली. आदिलशाहाशी तह असल्याने आदिलशाहा इतरांना मदत करणार नाही ह्या विश्वासाने रामराया काहीसा गाफिल राहिला. तो युद्धात मारला गेल्याने वर्चस्व असूनही फौजेची पळापळ झाली व मुसलमान विजयनगरात घुसले, तब्बल ६ महिने शहराची लुटालुट चालूच होती. अर्थात ह्या पराभवानंतरही विजयनगरचे साम्राज्य लयाला गेलेच नाही पण विजयनगर उर्फ हंपी ही राजधानी ओसाड, उद्ध्वस्त झाली. तिरुमलदेवाने राजधानी पेनुकोंडाला हलवली. मात्र हळूहळू त्यांचे साम्राज्य क्षीण होत गेले, सामंत, नायक बळजोर झाले आणि फुटून निघत गेले. शेवटचा वंशज श्रीरंग रायल ह्याची इकडे तिकडे खूपच परवड झाली आणि त्याच्या मृत्युने १६४६ साली विजयनगरचा शेवटचा दुवाहीनिखळून पडला.
साम्राज्य बळजोर होत गेल्यावर पैसाही आपोआप येतोच. विजयनगरच्या सम्राटांचा व्यापार चीन, श्रीलंका, अरब, इराणी लोकांशी सतत चालू असे. विजयनगरच्या वैभवाचे वर्णन दुमिंगुश पाईश, फेर्नांव नुनिझ, निकोलाय कोंन्ती अशा विविध प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केलेले आहे ते मूळातून वाचण्यासारखे आहे.