भाग १
शनिवार दि.११ मे २०२४. मे महिन्यातील कडकडीत उन्हाचा त्रास वाचावा म्हणून मी आणि शिंदे पहाटे पाच सव्वा पाचचे दरम्यान सांगली येथील आमच्या घरातून तुंग येथील मारुती मंदिरात जाण्यासाठी निघालो. शक्तीची देवता मारुतीरायाच आपल्याला ताकद देणार त्या जोरावर दोन-सव्वादोन तासात तुंगाला मंदिरात पोहोचलो. जाताना वाटेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य निरामय राहण्यासाठी व्यायाम,वाचन,योगाभ्यास,ध्यानधारणा अशा गोष्टी आवश्यक असल्याच्या चर्चा चालू होत्या.
मारुतीरायांना साष्टांग दंडवत घातला आणि प्रदक्षिणामार्गावर प्रदक्षिणा घालत असताना माझ्या डोक्यात नर्मदा परिक्रमेचा विचार पिंगा घालू लागला. प्रदक्षिणामार्गावर परिक्रमेचा विचार पिंगा घालताच मन त्याची पेरणी शोधू लागले. सन २००८ मधील माननीय प्रतिभाताई आणि सुधीर दादा चितळे यांचे नर्मदा परिक्रमे विषयीचे अनुभव कथन आणि ब्रह्मलीन जगन्नाथजी कुंटे उर्फ स्वामी अवधूतानंद यांच्या टिळक स्मारक मंदिरातील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या सुपीक मातीत हे बीज दडलेले दिसले. परतीच्या प्रवासात शिंदे बरोबर याचा उच्चार झाला आणि त्यानेही लगेच त्याला दुजोरा देऊन होकार भरला.त्याने केवळ होकारच भरला नाही तर लगेच संध्याकाळी जवळच्या मित्रांना फोन करून कल्पना सांगितली व्हाट्सअप ग्रुप तयार केला. मी ही संध्याकाळी घरात हा विचार बोलून दाखविला क्षणात होकार आला आणि बीज अंकुरण्यासाठी जणू मृगवर्षाव झाला.
बीज ते फल हा प्रवास सुफल संपूर्ण होण्यासाठी काय करावे काय टाळावे वगैरे यम,नियम विधी निषेध यांची उजळणी सुरू झाली.समाज माध्यमे, मुद्रित साहित्य यामधील विपुल माहिती धुंडाळण्या व्यतिरीक्त ज्यांनी प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांच्याशी बोलणे,शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटणे अशी आखणी केली.माझे मेव्हणे सुहासराव मराठे यांनी परिक्रमा केली असल्याने त्यांचेशी संपर्क केला.पुण्यातील विवेक चोळकर यांना भेटलो.त्यांनी स्वतः तयार केलेला पायी परिक्रमेचा फ्लेक्स नकाशाच मला दिला.याशिवाय विवेक दंडवते,बिमलखेडकर यांचेशी बोलणे झाले.चोळकर यांच्यामार्फत साने यांचा परिचय झाला त्यांची एक परिक्रमा झाली असून ते दुसरी परिक्रमा करणार असल्याने त्यांचीही भेट घेतली.
ढोबळ रूपरेषा तयार झाली.लगोलग त्याची शक्य तितकी अंमलबजावणी सुरू केली.त्यामध्ये रोज वजन घेऊन किमान १० किमी चालणे,२०० पायऱ्या चढ उतार, सूर्य नमस्कार,योगासने याशिवाय
१) थंड पाण्याने आंघोळ २) स्वतःचे कपडे स्वतः धुणे,३) ताट,वाटी घासणे ४) तोंडावर पांघरूण घेऊन झोपणे.५) लाईट सुरू असताना झोपणे. ६) बिन उशीचे झोपणे ७) गादीवर न झोपणे ८) मोबाईल व टिव्हीचा कमीतकमी वापर ९) वृत्तपत्र न वाचणे याचा सराव सुरू केला. या भौतिक, शारीरिक अभ्यासाबरोबरच,एखाद्या मंदिरात डोळे मिटून शांत बसणे, आजूबाजूचा कोलाहल न ऐकणे, सकारात्मक उर्जा स्थानांना भेटी देणे, संतसाहित्य व अद्वैत ग्रंथ वाचन असा शारीरिक,मानसिक व बौद्धिक तंदुरूस्तीचा अभ्यास सुरू केला.मौनाची आवश्यकता ठळकपणे समोर आली पण कंठ फुटल्यापासुनच्या बडबडीच्या सवयीने मौनाचा सराव म्हणावा तसा झाला नाही.
या बाह्य आणि आंतरिक परिवर्तनाचा सराव सुरू होता.बाह्यपरिवर्तन भौतिकता व बुध्दीशी निगडीत असल्याने त्याचा सराव अवघड वाटत नव्हता परंतु आंतरिक परिवर्तन आध्यात्मिकता व भावनाविश्वाशी निगडीत असल्याने तेथे चाचपडणे सुरू होते.This is neither a trek nor a marathon run but a spiritual walk along the banks of holi river Ma Narmada हे वाक्य मनात घोळत होते.संपूर्ण शरणागत झाल्यानंतर आपल्या देहाकडून परिक्रमा पूर्ण करवून घेतली जाते. निसर्ग,विश्व,ब्रम्हांडाशी तादात्म्य होणे हा spirituality उर्फ अध्यात्माचा एक आयाम आहे.आपल्या पातळी नुसार ही तादात्मता साधता येते.
एके दिवशी नित्योपासनेतील दासबोधातील सच्छिष्य लक्षण समास समोर आला आणि
म्हणोनी साधन अभ्यास आणि सद्गुरु| सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू| सत्कर्म आणि सद्वासना पारू| पाववी भवाचा|
सदुपासना सत्कर्म |सत्क्रिया आणि स्वधर्म | सत्संग आणि नित्यनेम| निरंतर| या ओव्यांनी मार्गदर्शन केले.शुध्द आचार,उच्चार आणि विचार,निष्ठा,दक्षता,उदारता,तत्परता यांसह शक्ति,युक्ती,बुध्दी,धारिष्ट्य,दृढ संकल्प,कायाक्लेश,लीनता अंगी बाणवली पाहिजे याची जाणीव झाली.हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद नर्मदा मैय्या आणि तो सर्वसाक्षी ईश्वर यांचेकडे मागितली. ज्या ज्या वेळी हे शिव धनुष्य मला पेलेल का अशी शंका आली त्यावेळी गीतेतील नवव्या अध्यायातील
अपि चेत्सुदुराचार: भजते मामनन्यभाक्
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:
(असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो
मानवा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय)
या ओळींनी या दुराचाऱ्याच्या मनातील निश्चय ज्योत तेवत ठेवली.
कोणतीही गोष्ट करताना काहीतरी उद्देश असतोच.माझा परिक्रमेचा उद्देश शक्य तेवढे बाह्य व आंतरिक परिवर्तन स्वतःमध्ये घडविणे,नर्मदा मैय्या व त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे आज वरच्या समृध्द जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि भावगीताच्या भाषेत
मागणे न काही सांगण्यासी आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो हे गुज मैय्याला सांगणे त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मला भजनदंग राहू दे अशी प्रार्थना करणे असा होता.
नोव्हेंबर मध्ये परिक्रमा उचलावयाची होती त्यामुळे जुलैमध्ये रेल्वे तिकीट आरक्षण करणे भाग होते. तिकीट आरक्षण करताना बुद्धिच्या आकलना पलीकडच्या काही गोष्टी घडल्या त्या पुढील भागात.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार १५/३/२०२५
फाल्गुन वद्य १ शके १९४६.
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग २
अत्यंत उत्साहाने परिक्रमेची पूर्वतयारी सुरू होती. मागील भागात सांगितल्याप्रमाणे आता रेल्वे रिझर्वेशनची गंमत सांगतो. पुण्यातून खांडवा येथे जाण्यासाठी रोज पुण्यातूनच सुरू होणाऱ्या दोन ट्रेन आहेत ११०७७ आणि १२१४९.
यापैकी ११०७७ झेलम एक्सप्रेस खांडवा येथे अवेळी पोहोचते. त्यामुळे त्याला प्राधान्य न देता १२१४९ पुणे ते दानापूर या गाडीचे आरक्षण करावे असे ठरले. त्यावेळी १२० दिवस अगोदर आरक्षण सुरू होत असे त्यामुळे जुलैमध्ये आरक्षण सुरू होण्याच्या दिवशी आठ वाजता गाडी सर्च केली तर १२१४९ या गाडीचे आरक्षण पुढील सुचनांपर्यंत स्थगित केले आहे असा मेसेज येत होता. 139 या रेल हेल्पलाइनला फोन करून काही उपयोग झाला नाही. शेवटी माझे रेल्वेतून रिटायर झालेले कोल्हापूरचे मित्र शेटे यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. चौकशीअंती असे कळले की काही काळासाठी आरक्षण स्थगित ठेवले आहे लवकरच सुरू होईल. सर्वानुमते तोपर्यंत थांबण्याचे ठरले. काही दिवसानंतर या गाड्यांचे आरक्षण 18 जुलैपासून सुरू होईल असे नोटिफिकेशन आल्याचे समजले.
आरक्षण सुरू झाल्या झाल्या दहा मिनिटातच फुल होऊन वेटिंग लिस्टला कसं जातं हे न सुटलेले कोडं डोक्यात घेऊन १८ जुलै रोजी सकाळी आठ वाजता IRCTC APP उघडले तर नेमकी १२१४९ ही गाडी सोडून इतर गाड्या ओपन झाल्या होत्या. सर्वांना फोन करून सांगितल्यानंतर शेवटी आता अधिक वाट न बघता ११०७७ झेलम एक्सप्रेसचे रिजर्वेशन करावे असे ठरले. त्याप्रमाणे मी पुढे गेलो आणि पेमेंट करण्याचा ओटीपी सुद्धा एंटर केला परंतु पेमेंट फेल झाल्यामुळे रिझर्वेशन झाले नाही बँकेतून माझी रक्कमही वजा झाली नव्हती. पुन्हा पाहतो तर तोपर्यंत १२१४९ या आम्ही ठरविलेल्या गाडीचे रिझर्वेशन ओपन झाल्याचे दिसले लगेच पुन्हा सुरवात केली आणि आश्चर्य असे की आम्हाला पाहिजे त्या गाडीचे तिघांचेही कन्फर्म रिझर्वेशन मिळाले.
ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होणे, बँकेतून माझी रक्कम वजा न होणे आणि नंतर आम्हाला हवी ती गाडी ओपन होऊन त्याचे निश्चित आरक्षण मिळणे या घटनेतून मी असा बोध घेतला की, नर्मदा मैया तुमची परीक्षा पाहते पण त्यात तुम्ही उतरला तर ती तुम्हाला नक्कीच कडेपर्यंत पोहोचविते.
मनी धरावे ते ते होते| विघ्न अवघेचि नासोन जाते|
कृपा केलीया रघुनाथे| प्रचित येते|| या ओवीचा प्रत्यक्षानुभव वेगळा काय असणार.
अन्यथा ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होण्याच्या ७% (ही माहिती गुगलच्या सौजन्याने) एवढ्या कमी शक्यतेत माझे पेमेंट फेल व्हावे बँकेतून पैसेही वजा होऊ नयेत आणि पाहिजे त्या गाडीचे रिझर्वेशन मिळावे हा योगायोग नक्कीच नाही.
या घटनेनंतर माझी श्रध्दा अधिक दृढ झाली, की खरंच नर्मदा मैया माझ्याकडून नक्की परिक्रमा पूर्ण करून घेईल. प्रवासाची अनिश्चितता संपली. परिक्रमे दरम्यान सुटसुटीत पोशाख कसा असावा याची चर्चा सुरू झाली. धोतर-पांढरा अंगरखा,पायजमा-पांढरा शर्ट,लुंगी-शर्ट,धोतर-बंडी असे अनेक पर्याय समोर होते. सुटसुटीत पणाच्या दृष्टीने रामदासी पद्धतीने छाटी प्रकाराचे धोतर नेसून वर बंडी घालावी असे ठरले.सर्वकाळ वजन पाठीवर वागवावयाचे असते त्यामुळे पाठपिशवीचे वजन कमीतकमी ठेवण्यासाठी धोतर-बंडी दोन जोड,पंचा,आंघोळीचे कपडे,स्वेटर,स्लिपींग बॅग,थर्मल वेअर,हातमोजे,पायमोजे,मोठे सुती रूमाल,ताट,पेला,छोटी कात्री,सुई दोरा, आवश्यक औषधे,पूजा साहित्य,नर्मदा मैय्याची तसबीर,कमंडलू,दंड असे कमीतकमी साहित्य अंतिम केले. सर्व मिळून ७-७.५ कि.वजन झाले.शारिरीक गरजांसाठी अत्यावश्यक साहित्याचे ओझे खरंतर कमी आहे पण त्यात चोचले पुरवण्यासाठीचे साहित्य मिळवले तर ते ओझे आपणास वाकवते याचा धडा मिळाला.
दैनंदिन व्यायाम,उपासना,वाचन,मनन सुरू होतेच पण आता सर्व लक्ष प्रवासाचा दिवस कधी उजाडतो याकडे होते. पुढील भागात प्रत्यक्ष मैय्या दर्शन व परिक्रमा उचलली त्याचे कथन पाहू.
प्रकाश फडके
सांगली
गुरूवार दि.२७/३/२०२५
फाल्गुन वद्य १३ शके १९४६
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ३
सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान खांडवा स्टेशनला उतरलो तेथून नर्मदा परिक्रमा उचलण्यासाठी ओंकारेश्वरला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. खांडवा हे आपल्या सर्वांचे लाडके गायक किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगुली यांचे जन्मगाव. बसमधून जाताना त्यांचे स्मारक झर्रकन मागे पडले आणि
आनेवाला पल जानेवाला है,हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है. हे गोलमाल चित्रपटातील गीत नकळत ओठांवर आले वर्तमानकाळात जगावे असा सुंदर संदेश देणारे गुलजार यांचे शब्द.
एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं
वहाँ दास्तां मिली,लमहा कहीं नहीं
थोड़ा सा हँसाके,थोड़ा सा रुलाके
पल ये भी जाने वाला हैं हे शब्द किती सहजतेने, येणारा क्षण जाणार आहे तो परत येणार नाही, त्यामध्ये कधी डोळे दु:खाश्रूंनी ओले होतील तर कधी आनंदाने विस्फारतील असे सांगतात.त्यामुळेच याक्षणी घडणारी कहाणी अशी घडवू की ती प्रेमादरपूर्वक सर्वांना सांगता येईल.नर्मदा परिक्रमेदरम्यान जो काळ व्यतित होणार आहे त्यात वर्तमान भान सतत जागृत राहून त्यामधून अशी कहाणी घडू दे अशी मैय्याला प्रार्थना केली आणि ओंकारेश्वरला उतरलो.
गजानन महाराज आश्रमात खूप गर्दी होती.त्यामुळे आम्ही आमची व्यवस्था दुसरीकडे लावली.
परिक्रमेच्या नियमानुसार नर्मदामैय्याचा प्रवाह एकदा परिक्रमा उचलल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत ओलांडायचा नसतो त्यामुळे मंधाता परिक्रमा लगेचच करण्याचे ठरविले.
नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर गेलो.मध्यम वेगाने वहात असणारा पुण्यसलिलेचा प्रवाह,मांधाता पर्वत असे निसर्गनिर्मित दृश्य समोर होते तर उजव्या हाताला ९५० मी. लांब तर ३३ मी उंच धरण,झुलता पूल असे मानवाच्या निर्मितीचे सुंदर दृश्य होते.झुलता पुल पार करून ओंकारेश्वराचे दर्शन घेतले.मनोभावे नमस्कार केला. आद्य शंकराचार्य रचित निर्वाण षटक गुणगुणताना
नमे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानंद रूप: शिवोहम् शिवोहम्
या ओळींकडे नर्मदा परिक्रमेच्या पूर्वसंध्येला विशेषत्वाने लक्ष जाऊ लागले.या अत्युच्च कोटीच्या स्थितीतील साधू संत
परिक्रमे दरम्यान भेटावेत,या सत्संगामुळे माझ्यात ठासून भरलेले हे सर्व दोष निदान सैल व्हावेत असे वाटू लागले.
त्याच भावावस्थेत मांधाता परिक्रमा सुरू झाली.( अंतर अंदाजे ७ ते ८ कि.मी.) परिक्रमा मार्गावर श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण १८ अध्यायातील ७०० श्लोक कोरून लावले आहेत.मार्गात मैय्याच्या किनाऱ्या लगतचे रामकृष्ण मिशनचे साधना कुटीर लक्ष वेधून घेते.पुढे नर्मदा मैय्या व कावेरी नदी संगम आहे.संगमात स्नानासाठी गर्दी होती.
पुढे आलो, ऋण मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.परिक्रमा मार्गातील १०८ फूट उंचीचा आद्य शंकराचार्यांचा पुतळा आजही शैव,वैष्णव,शाक्त,गाणपत्य,सौर अशा विविध संप्रदायांकडे अद्वैत दृष्टीने पहात असून सर्वांनी एकोप्याने रहावे असा प्रेमळ संदेश देत आहे असेच वाटते.
त्याच परिसरात भगवान शंकरांची ५० फूट उंच मूर्ती आहे.तीन मजली महादेव मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून मैय्या,कावेरी संगम दर्शन होते.वाटेतच मारूती मंदिरात पहुडलेल्या हनुमानाचे दर्शन होते.मार्गात शेवटी भग्नावस्थेतील सिध्दनाथ मंदिर आहे.मंदिरातील शिल्पकला डोळ्यांचे पारणे फेडते पण त्यांची अनैसर्गिक भग्नावस्था विषण्ण करते.
परिक्रमेच्या अंतिम टप्प्यात विसाव्यासाठी थांबलो असता एक वृध्दत्वाकडे झुकलेल्या माताराम आमच्याकडे पाहून म्हणाल्या परिक्रमा उठा रहे हो क्या? मी होकार दिल्यावर त्याही विसावल्या आणि सुनो म्हणत सांगितले की, मैय्याके किनारे महज घुमना परिक्रमा नहीं है,आपस में बाते मत करो,मैय्या का नाम लेते चलो, मंदिर हो तो अंदर जा के प्रणाम करो,जितना हो सके ऑखें बंद करके मूर्ती की मानसपूजा करने की कोशिश करो,रास्तेमें दुसरोंने फेका हुआ कचरा भले मत उठाओ लेकीन हमसे कचरा ना हो इसका ध्यान रखो,खानपान के समय भरपेट मत खाओ,किसिसेभी,कुछ भी होने पर गुस्सा मत करो,मन में सबके प्रति हमेशा प्रेमभाव रखो,सुबह-शाम मैय्याकी आरती भावसे करो,मैय्या हमेशा आपके साथ है इसका पुरा भरोसा करो और आनंदभावसे परिक्रमा उठाओ, तो वो परिक्रमा सफल कराने की जिम्मेदारी मैय्या खुद संभालेगी तुम्हे चिंता की जररूत नहीं. असे म्हणून आम्हाला नर्मदे हर! म्हणून त्या निघून गेल्या.
नर्मदा मैय्यानेच पूर्वसंध्येला येऊन उपदेशात्मक आशिर्वाद दिल्याने मन भावविभोर झाले त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे म्हणत मैय्याला नमस्कार केला आणि उद्यापासून उचलावयाच्या परिक्रमेचे चिंतन करत निद्रावश झालो.पुढील भागापासून प्रत्यक्ष परिक्रमेतील अनुभव पाहू.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार दि. २९/३/२०२५
फाल्गुन कृ.१५ शके १९४६
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
. भाग ४
आज १५ नोव्हेंबर २०२४ कार्तिक पौर्णिमा परिक्रमा उचलण्याची संकल्प पूजा करावयाची होती.वास्तविक अनेकांचे पूर्वानुभव पहाता ही पूजा अनिलदास महाराजांकडूनच करून घ्यावी असे वाटत होते.परंतू एका मित्राने अगोदर पासूनच एका गुरूजींना ठरवून ठेवले होते त्यामुळे त्यांची वाट बघत थांबलो होतो.फोनाफोनी चालू होती.आम्हाला घाटावर उभे राहिलेले पाहून एका मैय्याने विचारले सुध्दा की,अनिलदास महाराजांकडे जाणार आहात का? तो मित्रही म्हणाला जाणार असाल तर तुम्ही दोघे जा.पण भीड आड आली.पहिलेच दिवशी विकल्प नको म्हणून थांबलो.ते ठरविलेले गुरूजी आले पण त्यांनी सांगितलेल्या पूजेने मानसिक समाधान मिळाले नाही.घाटावरील पंडे कसे लूटतात याचा अनुभव आला.असो.कोणत्याही परिस्थितीत मन:शांती ढळू द्यायची नाही असे ठरविले असल्याने शांत रहाता आले.वास्तविक एका मैय्याने विचारणे व त्या मित्राने परवानगी देणे हे अनिलदास महाराजांकडून पूजा करून घेण्यासाठीचे संकेत होते पण भीड नडली.अर्थात त्या गुरूजींचा अनुभव चांगला न आल्यानेच हा तर्क सिध्द झाला.मैय्याला पुढे काय होणार हे ही माहित असते त्यामुळेच ती संकेत देते ते वेळीच ओळखण्याची बुध्दी व्हावी व कोणाचीही भीड बाळगू नये या धड्याने संकल्प पूजेनंतर नर्मदा मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाऊन नर्मदे हरचा गजर करत परिक्रमा मार्गावर पहिले पाऊल उचलले.
नामस्मरण आणि गीता पठण यामुळे चालताना त्रास होत नव्हता.कोठी येथे एक रोटी बाबा आश्रमाचा फलक दिसला त्यांची माहिती अद्भूत आहे.मूळ नाव शिवोहम भारती असणारे एक रोटी बाबा ओरिसाचे रहिवासी असून इंग्रजीचे प्राध्यापक होते.९० च्या दशकात आध्यात्मिक ओढीने त्यांनी हृषिकेश येथे संन्यास दिक्षा घेतली व पदयात्रा करत ओंकारेश्वरला आले.१२ कोटी ॐ नम:शिवाय जपाची साधना त्यांच्या गाठीशी आहे.एक रोटी अभियान चालवून गरजुंना अन्नदान हा त्यांचा संकल्प गेली २५-३० वर्षे अव्याहतपणे सुरू असल्याने ते एक रोटी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची संधी मात्र मिळाली नाही.असो मैय्याची ईच्छा!
१३ किमी चालून मोरटक्का येथील भक्तराज आश्रमात दुपारी १ चे दरम्यान पोहोचलो.भोजनप्रसादी घेतली.हात धुण्याची व भांडी धुण्याची जागा वेगवेगळी होती. परंतु एक परिक्रमावासी त्याचा वापर बरोबर उलटे करत होते.तेथील सेवेकरी मैय्याने कडक शब्दात फलक वाचा असे सांगून त्याची जाणीव करून दिली.एरवी हा प्रसंग अपमानजनक वाटला असता पण परिक्रमा वासी या एका उपाधीने तो अपमान न वाटता
”उघडा डोळे बघा नीट” या उक्तीची आठवण करून देणारा वाटला.
सद्गुरु अनंतानंद साईश यांचे शिष्य प.पू.भक्तराज महाराज यांच्या जीवन चरित्राचा अल्प परिचय झाला.भजन,भ्रमंती,भंडारा हे त्यांच्या भक्तीचे तीन आयाम आहेत. त्यांच्या उपदेशात ते म्हणतात
आपल्या नित्य नैमित्तिक कर्मात रत असताना सुध्दा ईश्वर स्मरण असावे,कारण जर विस्मरण झाले तर धडपडल्या आणि
ठेचकळल्याशिवाय आपण एकही पाऊल टाकू शकणार नाही.
पू.भक्तराज महाराज.
(जिज्ञासूंनी https://bhaktarajmaharaj.org/index.html
ही लिंक पहावी)
सायंकाळी मैय्या किनारी दर्शनाला गेलो.सुर्यास्त समयीचे रक्तवर्ण सूर्यबिंब मैय्याच्या पाण्यात प्रतिबिंबित झाले होते.प्रवाह,तरंग,तुषार हे सुध्दा लोभस लाली ल्याले होते.प्रतिबिंब पाण्याबरोबर हेलकावत होते तर बिंब स्थिर होते.बिंब प्रतिबिंबाचा हा खेळ न्याहाळत मैया किनारी शांत बसून राहिलो.तेथेच मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाईले.सायंकाळच्या रम्य वातावरणात आरती व नर्मदाष्टकमचे शब्द मनाचा ठाव घेत होते.पापनाशिनी मैय्याला नमन करुन भावविभोर अंत:कर्णाने पहिला दिवस संपन्न झाला.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि. २०/०४/२०२५
चैत्र कृ.७ शके १९४७.
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ६
आश्रमात गर्दी होती त्यामुळे पहाटे चार पासूनच परिक्रमावासीयांची वर्दळ सुरू झाली.मैय्या किनारी जाऊन स्नान केले.माझी प्रात:कालीन नित्योपासना होईपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त परिक्रमावासी मार्गस्थ झाले होते.वास्तविक परिक्रमा नियमाप्रमाणे (अपवाद वगळता)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिक्रमा करावयाची आहे.असो.
मंदिरातील काकड आरती झाली.पूर्व क्षितीज रक्तवर्ण होऊ लागले.पहाटवाऱ्याने लता,वेली आंदोळल्या,पाने सळसळली,मैय्याच्या पाण्यावर लोभस तरंग उमटले,घड्यात पाणी भरताना येणारे आवाज त्यात मिसळले अशा नादमय वातावरणात सूर्यदर्शन घेतले आणि मार्गस्थ झालो.
कापूस,एरंड,पपई,केळीची शेते पार करत भट्यान गावात पोहोचलो.संत सियाराम बाबा या महान विभूतीच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झाले आहे.१०४ वर्षीय बाबा कोणाच्याही आधाराशिवाय चालतात.अनेक वर्षे एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली आहे.ते आजही चष्म्याशिवाय रोज कित्येक तास रामचरित मानस वाचन करतात.कोणत्याही ऋतूत फक्त एक लंगोटी एवढेच त्यांचे वस्त्र आहे.सुखाचा मंत्र सांगताना ते म्हणतात,
सुखी वही होगा जिसने कामना,वासना,लालसाका परित्याग कर दिया.माझे भाग्य असे की,या तपस्वी संतांचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेता आले ( मी भाग्य शब्द याकरिता वापरला की त्यानंतर थोड्याच दिवसात ११ डिसेंबर २०२४ रोजी हे महात्मा ब्रह्मलीन झाले) त्यांच्या आश्रमात ते कोणाकडूनही फक्त रू. १० एवढीच देणगी स्विकारतात.या गावातील आश्रमात भक्तगण,परिक्रमा वासी यांचेसाठी अन्नदान चालते.निर्मोही,जितेंद्रीय,नि:काम अशा विभूतीमत्वांची भेट म्हणजे आपल्यातील दोष खिळखिळे करण्यासाठी घातलेला घाव आहे.हा घाव या दोषांच्या वर्मी बसू दे अशी प्रार्थना केली. या पवित्र क्षेत्री बालभोग (न्याहरी उर्फ नाष्टा या शब्दाला परिक्रमेच्या परिभाषेत बालभोग असा शब्द आहे) घेऊन लेपा या पुढील गावी जाण्यासाठी निघालो.
भारतीताई ठाकूर या कर्मयोगिनीच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध अशा लेपा गावी पोहोचलो. या विभूतीमत्वाची भेट घ्यायचीच हे मी पूर्वीच निश्चित केले होते. परंतु तिथे गेल्यानंतर राम मंदिरात अशी चर्चा चालू होती की, डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील एक मोठा कार्यक्रम त्यांच्या प्रशालेमध्ये होणार आहे आणि त्यासाठी अनेक महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत व्यस्त असल्यामुळे बहुतेक भेट होणार नाही. आम्ही विचार केला की, आपण जे पूर्वीपासून ठरविले आहे त्यात आपणाकडून बदल नको. त्यामुळे श्रीराम मंदिर लेपा येथून चार किलोमीटर दूर लेपा पुनर्वास येथील नर्मदालय या भारतीताई ठाकूर यांच्या कर्तृत्व मंदीरात पोहोचलो. परिक्रमावासी भेटण्यासाठी आले आहेत असा निरोप गेला आणि आश्चर्य म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख, उप पोलीस प्रमुख यांच्याबरोबर चालू असलेली बैठक थांबवून त्यांनी आम्हाला भेट दिली. परिक्रमा वासी ही एक उपाधी धारण केल्यानंतर नर्मदा मैया च्या कृपेने आपले महत्त्व कसे वाढते याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला.त्यांच्या पायावर माथा टेकवून आशिर्वाद घेतला. परिक्रमेदरम्यान पाळावयाची पथ्ये परिक्रमेचे नियम याबाबत काही कानमंत्र त्यांनी दिले. आता भारतीताई यांनी संन्यास दीक्षा घेतली आहे.२००५ मध्ये उघड्या डोळ्यांनी केलेल्या परिक्रमेने त्यांचे मातृहृदय कळवळले आणि २००९ पासून त्यांनी नेमाड प्रांतातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.त्यांची आपल्या कार्याविषयीची तळमळ पाहून स्थानिक समविचारी जवळ आले आणि Nimar Abhyudaya Rural Management and Development Association (NARMADA). या अपत्याचा जन्म झाला. एका हाताच्या बोटावर मोजता येणारी विद्यार्थी संख्या आता चार आकडी झाली आहे.निवासी शाळा,गोशाळा,फिरती विज्ञान प्रयोगशाळा अशा उपक्रमातून रत्नपारख्याकडून हिऱ्यांना पैलू पाडले जात आहेत.
स्वाध्याय परिवारात
नारायण मंत्र जपत हिंड तू जगात
कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात
असे भावगीत आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीताई.
(जिज्ञासूंसाठी वेबसाईट लिंक)
(https://www.narmadalaya.org/main/History)
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे यांनी एकदा जाहीरपणे खंत व्यक्त केली होती की, नम्रपणे माथा टेकावा असे पायच आता दुर्मिळ झाले आहेत. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरील अशी कर्तव्यनिष्ठांची मांदियाळी पाहून ही खंत दूर होते.आपला जीवनोद्देश शोधण्यास,शोधला असल्यास त्यावर अविचल रहाण्यास मदत करणारे असे पुण्यात्मे भेटणे ही परिक्रमेची पर्वणी मनात साठवून आजचा दिवस माझे रितेपण भरता झाला.
प्रकाश फडके
सांगली
सोमवार दि.२१/४/२०२५
चैत्र कृ. ८ शके १९४७