Wednesday, February 25, 2026

कुमाऊँमधील रम्य भटकंती

भाग १: प्रस्तावना
 नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता.

तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद! ट्रेकिंग आणि त्याच्यासोबत आकाशदर्शन, तेही अतिशय कडक थंडीमध्ये! थोडावेळसुद्धा उघड्या ठिकाणी बाहेर जाऊन बघणं किंवा अंगणामध्ये जाऊन आकाश दर्शन करणं अतिशय कठीण होतं! पण हा सगळा अनुभव ह्यावेळेस घेता आला.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका लग्नाच्या निमित्ताने पिथौरागढ़ला जाणं झालं. पुढे काही दिवस तिबेट सीमेपासून साधारण शंभर किलोमीटर अलीकडे मुन्सियारी म्हणून एक एक गाव आहे. त्या गावामध्ये थांबून ट्रेकिंग आणि आकाशदर्शन करायचं असं ठरवलं. तिथे इतकी कडक थंडी असते ह्या दिवसांमध्ये! मागच्या वेळेचा अनुभव होता की आपण अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे आपण मोकळ्या जागेमध्ये पाच मिनिटंसुद्धा थांबू शकत नाही! इतकी थंडी असते. अक्षरशः दोन-तीन अंश तपमान असतं. जवळच सगळा हिमालय आणि थंड प्रदेश असल्यामुळे वारे पण खूप गार असतात. त्याच्यामुळे किती वेळ प्रत्यक्ष आकाश दर्शन करता येईल ही शंका होती. तासांमध्ये करता येईल का मिनिटांमध्ये करता येईल इथपासून शंका होती. पण आकाश दर्शनसुद्धा मनासारखं करता आलं. खूप सुंदर आकाश बघता आलं! त्याला जोडून ट्रेकिंग सुद्धा करता आलं.


.

.

.

ह्या प्रवासाची सुरुवात १ डिसेंबरला झाली. मुंबई ते बरेली असा प्रवास ट्रेनने केला आणि बरेली मधून पुढे टणकपूरला बसने गेलो. उत्तर प्रदेश थोडासा बघितला. उत्तर प्रदेशातले कमालीचे धूळ असलेले रस्ते बघितले! बरेलीच्या जवळ एका ठिकाणी शेतामध्ये असलेला बिबट्यासुद्धा बघायला मिळाला होता! असा हा सगळा प्रवास झाला. टणकपूरला पुढची बस घेण्याच्या आधी रात्री एका छोट्या बस स्टॉपवर थांबावं लागलं. तेव्हापासून थंडीचा कहर सुरू झाला! आणि थंडीची तयारी किती कमी होती, ते मला लक्षात आलं. अक्षरशः एक एक मिनिट जात नव्हता आणि पुढची माझी बस जी होती ती मध्यरात्री तीनची होती. कारण पहाड़ी भागामध्ये रात्री बस कमी प्रवास करतात. पहाटे बस निघतात. टणकपूरची विलक्षण थंडी अनुभवली. मग पहाटे तीन वाजता बस निघाली.

टणकपूर उत्तर प्रदेश- उत्तराखंडच्या सीमेजवळ आहे. नेपाळला अगदी लागून आणि कालीगंगा नदीजवळ आहे. पुढे चंपावत- लोहाघाटमार्गे पिथौरागढ़चा प्रवास झाला. सकाळी साडेआठला तिथे पोहोचलो. पण रात्रीचा प्रवास थरारक होता! त्या घाटाच्या रस्त्यावर बस टर्न करायलासुद्धा फार कमी जागा असतात. अतिशय विलक्षण अशा या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली.


.

.

आठ दिवस मी उत्तराखंडमध्ये होतो. त्या दिवसांमध्ये फिरता आलं आणि ट्रेकिंग करता आलं. जिथे जिथे जाऊ शकलो खूप विलक्षण वाटत होतं. सतत मी किती भाग्यवान आहे हीच जाणीव व्हावी, असा हा प्रवास होता. हा सगळा प्रवास व त्यातले अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे.

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 डिसेंबर 2025.

समाजजीवनमानआस्वादलेख

प्रतिक्रिया

वाचतोय. फोटो आवडले. भाग्यवान आहात, सावकाशपणे सर्व पाहात आहात.

आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली.

IMG_7853

IMG_20190427_113916_487

भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़! रस्ता कुठे बंद नाहीय आणि ट्रॅफिक जामही नाहीय. त्यामुळे तसं लवकरच म्हणजे साडेआठला पिथौरागढ़ला पोहचलो.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

लग्नाकरता येणा-या नातेवाईकांसाठीच्या हॉटेलमध्ये जायचं आहे. पिथौरागढ़! साधारण १६०० मीटर उंचीवर वसलेलं शहर. दूरवर हिमशिखरं दिसत आहेत! कोवळ्या ऊन्हाचा आनंद घेत रस्ता विचारत निघालो. काही मुलं सोबतीला आली. त्यांनी शॉर्ट कट असलेल्या पायवाटा (पगडंडी) दाखवल्या. पहाड़ी लोक खरंच खूप वेगळे आहेत. त्यांच्यासोबत छोटा पण मस्त वॉक झाला. नंतर बायकोच्या बाजूचे नातेवाईक भेटले. गप्पा- गोष्टी झाल्या. लग्नासाठी आलेल्यांच्या भेटी झाल्या. नंतर भरपूर आरामही झाला.

डिसेंबर महिना असल्यामुळे इथे सूर्यास्त लवकर होतो. साडेपाचनंतर लगेच अंधार होतो! आणि दुपारी कमी असलेली थंडी लगेच फणा काढते! पिथौरागढ़च्या हॉटेलच्या गच्चीतून आकाश बघितलं. शहराचे दिवे बरेच आहेत आणि चंद्रही पोर्णिमेजवळ आहे. त्यामुळे चांगल्या स्वच्छ आकाशासाठी अजून वाट बघावी लागेल.


.

.

.

रात्री चांगला आराम झाल्यावर दुस-या दिवशी ४ डिसेंबरला चंडाक हिलकडे जायला निघालो. लग्नाचे विधी दुपारनंतर आहेत. त्यामुळे सकाळी १० पर्यंत मोकळा वेळ आहे. हॉटेलपासून चंडाक हिल साधारण साडेसात किलोमीटर येतं. गावातला मुख्य रस्ता माहिती आहे. त्यामुळे सहजपणे निघालो. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेतले आणि पुढे निघालो. हळु हळु घरं, दुकानं, सरकारी कार्यालयं मागे पडली आणि डोंगर सुरू झाला. दूरवरचे नजारेही सुरू झाले! अहा हा! हिमालयाच्या भव्यतेचा अनुभव देणारा हा परिसर! सकाळचे फिरायला आलेले तुरळक लोक सोडले तर निर्जन असा घाटाचा रस्ता! बाजूला डोंगरात व खाली छोटी गावं! सुंदर भ्रमंती‌ झाली. पूर्ण डोंगर चढल्यावर दूरवर अनेक हिमशिखरं नजरेच्या कक्षेत आली! त्याशिवाय दूरवरच्या डोंगरातले नागमोडी रस्ते आणि गावंही दिसत आहेत. एका ठिकाणी देवदार झाडांमध्ये जाणारी सुंदर पायवाट आहे! अहा हा! अवर्णनीय अनुभव! मनसोक्त फिरलो. थंडी इतकी कडक की, पूर्ण १५ किलोमीटर झाले तरी एक थेंबही घाम आला नाही आणि अजिबात तहानही लागली नाही! फक्त स्वेटर काढता आलं इतकंच. परतीच्या मार्गावर परत चहाचा ब्रेक घेतला आणि हॉटेलवर पोहचलो. बरेलीमधल्या "सॅटेलाईट" बसस्टँडनंतर इथे "उल्का माता मंदिर" आणि "अंतरिक्ष बंगलासुद्धा" बघायला मिळाला!

दुपारनंतर हळु हळु लग्नाचे विधी सुरू झाले. हिमालयात तरी डीजेचा त्रास नसावा अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अर्थात् दिल्लीसारख्या ठिकाणी होतो तितका त्रास नव्हता. लग्नामध्ये बँड वाजवणारे लोक मस्त सजून आले आहेत. पारंपारिक वाद्य आणि पहाड़ी संगीत! वरात मुलीकडच्या मंगल कार्यालयात गेल्यानंतरच दुपारचं जेवण झालं. इथल्या संगीताची शैली आणि वरातीतल्या लोकांचा पोशाख काहीसा तिबेटी बौद्ध पद्धतीचा वाटला. ऊन असेपर्यंत थंडी वाट बघत थांबलीय! लग्नाचे उरलेले विधी नंतर आहेत आणि ते खूप वेळ चालू राहतील. त्यामुळे आम्ही काही जण संध्याकाळी पिथौरागढ़वरून सत्गढ़ ह्या गावाला जायला निघालो.


.

.

सत्गढ़! पिथौरागढ़पासून २० किलोमीटर अंतरावर पण अगदी डोंगरात वसलेलं‌ हिमालयातलं पहाड़ी गांव! मागच्या वेळी इथलं आकाश अ वि श्व स नी य होतं! दरीमध्ये असलेली गावं अंधारात बुडाली आहेत! हळु हळु संधीप्रकाश जातोय. अंधारातच सत्गढ़ला पोहचलो! इथे जाताना आता कच्चा रस्ता झालाय. पण सुदैवाने आम्ही अशा जागी उतरलो जिथून मस्त पायवाटेने जावं लागेल. तीव्र चढाची पण छोटी सात मिनिटांची पायवाट! एक सुंदर ट्रेक. चला, निदान पायी चालताना तरी थंडीपासून सुटका मिळतेय! पण कसलं काय! जेमतेम चालत असेपर्यंत आणि पाच एक मिनिट गरम वाटलं. नंतर लगेच थंडीचा कडाका सुरू! आकाश दर्शन करणं खरंच सोपं नाहीय! थंडी भयाण होतेय! आकाशात थोडे ढग आहेत! कुठे कुठे अंधुक तारे दिसत आहेत. पण चंद्राचं तेज आकाशात पसरलंय! समोर डोंगरात ध्वज मंदिरातला दिवा चमकतोय! हिमालय! वा!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जानेवारी 2026.


भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन

✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं!
✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग
✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं
✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!"

सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत. सिंह रास- मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी दिसत आहेत. फोटोग्राफीसाठी मोबाईल सेट करून ठेवला. हात थड थड कापत आहेत. पण अहा! काय रम्य पहाट! हळु हळु पक्ष्यांचं कूजन सुरू झालं!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

सत्गड़! १९०० मीटर उंचीवरचं गाव. इथे जानेवारीनंतर बर्फ पडतो. आत्ताही भयाण थंडी आहे. इतकी थंडी की, तोंड धुणं- चूळ भरणंही नकोसं वाटावं! उजाडल्यानंतर चहा घेतला. इथे चहा हा पिण्याहून खूप मोठा अनुभव आहे! आधी हात गरम करायचे. नंतर चेह-यावर वाफ घ्यायची! आणि मग हळु हळु चहा घ्यायचा. असा पहिला राउंड! दिवसभरात किमान दोन आकडी राउंडस नक्की होतात! नंतर सहज तपमान बघितलं तर दिसलं की, सकाळी आठ वाजताचं सत्गड़मधलं तपमान १ अंश सेल्सियस आहे! म्हणजे पहाटे अजून कमी असणार! व्वा! तासभर तरी आकाश दर्शन करता आल्याचा आनंद झाला.

थोडा दिवस वर आल्यावर आणि दुसरा चहा व नाश्ता झाल्यावर फिरायला बाहेर पडलो. इकडे कुठेही गेलो तरी रम्य परिसर! नव्याने झालेला जीपचा कच्चा रस्ता बघत बघत त्या दिशेने बाहेर पडलो. डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, दूरवर वर आलेला सूर्य आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! अहा हा! आणि फुलं- झाडं तर खूप सुंदर. पुढे मोकळ्या जागेमधून दूरवरची दृश्य समोर आली‌ आणि सकाळच्या केशरी ऊन्हात चमकणारे हिम शिखरही दिसले! व्वा! कच्च्या रस्त्याने खाली उतरून धारचुला हायवेला आलो. मनसोक्त पायपीट केली. मन भरणार नाही हे माहिती असूनही फोटो घेतले.


.

.

.

.

.

मुलीसोबत अजिंठा- वेरुळ- देवगिरी फिरलो होतो तेव्हा ती म्हणाली होती, अरे हा तर खारूताईंचा जिल्हा आहे! जिथे तिथे खारूताई! तिच्या हातावरसुद्धा खारूताई आली होती तेव्हा. तसा हा पिथौरागढ़ जिल्हा मला तिच्या लाडक्या ब्याऊंचा जिल्हा वाटतोय! तिच्या ऍलेक्ससारखेच ऍलेक्स सगळीकडे दिसत आहेत! तासभरात पाच किलोमीटर फिरलो आणि परत नातेवाईकांच्या घरी आलो. दिवसा समोरचा ध्वज मंदिराचा डोंगर, शेती, जंगल काय दिसतंय! कोवळं ऊन आणि चहा!

दिवसभरात गप्पा, चहा, आराम आणि निसर्गाला न्याहाळण्याचा क्रम सुरू राहिला. इथे दिवस तसा छोटा आहे. समोरच डोंगर आहेत, त्यामुळे सूर्य एक तास उशीरा प्रकट होतो आणि दुपारी तीननंतर परत डोंगराआड जातो! दुपारच्या वेळीच ती थंडी थोडी कमी वाटते. लोक दुपारी बाहेरची कामं करतात. गुरांचा संभाळ, जंगलाजवळून गवत डोक्यावरून आणणं, काही घराची कामं असं करतात. चार वर्षांपूर्वी इथे नेटवर्क खूप विरळ होतं. आता अगदी जोरात आहे. गावात घरांची कामंही सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी पिथौरागढ़मध्येही गूगल पे चालत नव्हतं. आता सत्गड़मध्येही चालतंय!

दुपारी ध्वज मंदिराला जायचं होतं. पण माझ्या भाच्याला जमलं नाही. म्हणून नंतर माझ्या साडू- भाऊंबरोबर सत्गड़च्याच वरच्या भागात थोडा ट्रेक केला. डोंगर चढून वर गेलं की एक मैदान आहे. हनुमानाचं मंदिर आहे. तिथे मोकळ्या जागेतून विलक्षण नजारा दिसला! पंचाचुली शिखरं, ॐ पर्वत आणि इतर शिखरं खूप छान दिसत आहेत. बायनॅक्युलरमधून अजून छान दिसली आणि फोटोही घेता आले. अंधार पडायच्या आत तिथून परत यायला निघालो. येताना एक थरारक प्रसंग झाला!

आम्ही वेगाने शेतांमधून खाली उतरत घराकडे येत होतो. साडू भाऊंचं घर सत्गडमधलं जवळ जवळ सगळ्यांत वरचंच घर. पुढे लगेच जंगल व डोंगर सुरू होतो. घरापासून जेमतेम ३०० मीटर अलीकडे असताना साडू भाऊ एकदम थांबले आणि मला हाताला धरून धावायला लागले. त्यांनी हळु आवाजात मला सांगितलं, "शेर! देखो वहाँ खड़ा है!" खाली शेतात आणि घराच्या अगदी वर १०० मीटर अंतरावर खराच एक काळपट पिवळा मोठा प्राणी दिसत होता. आणि तो स्थिर होता. आम्हांला बघूनही पळाला नाही. ते पुढे म्हणाले की, कोल्हा असता तर पळून गेला असता. पण हा स्थिर उभा आहे, म्हणजेच तो वाघ आहे! आणि इथे तसे वाघ व इतर प्राणी काही नवीन नाहीत! अंधार पडल्यामुळे फोटो घेता आला नाही किंवा बायनॅक्युलरनेही बघता आलं नाही. दोन मिनिटांत तो हललेला दिसला व नंतर झाडीत दिसेनासा झाला! आम्ही नंतर लांबच्या वाटेने खाली उतरलो. साडू भाऊंच्या नजरेतून जाणवत होतं की, तो कोल्हा नव्हता!

घरी पोहचलो, चहा घेतला आणि रात्रच झाली! अगदी साडेपाच वाजता पूर्ण अंधार आहे आणि तारे दिसत आहेत! थंडी सहन होईल तितका वेळ म्हणजे अर्धा- पाऊण तास दुर्बीण सेट करून आकाश दर्शन केलं. नंतर मग मोबाईल फोटोग्राफी सुरू केली. इथे रात्री साडे- सहा- सातपर्यंत नीजानीज होते! संध्याकाळी उद्याचा कार्यक्रम ठरवला. उद्या सकाळी लवकर मुन्स्यारीला जायला निघेन. खाली रोडवरूनच थेट जाणारी जीप मिळेल. सत्गड़- कनालीछीना- जौलजिबी- मदकोट अशा रस्त्याने जायला मिळेल. बारा वर्षांपूर्वी उत्तराखंड मदत कार्यामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा ह्याच गावांमध्ये फिरलो होतो. उद्या परत तिथे जायला मिळणार! कडक थंडीमुळे घेतलेल्या रजाई- पांघरुणासोबतच्या उत्सुकतेसह निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 7 जानेवारी 2026.


भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास
✪ गोरी गंगेच्या तीरावर!
✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी
✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव
✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक
✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय!

६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच. वळणा वळणाचा रस्ता! उलटीची भिती नको म्हणून पोहचेपर्यंत काहीच खायचं नाही असं ठरवलं. टनकपूर- पिथौरागढ़ प्रवासातही उपास केला होता. त्याचा उपयोग होतो, असा माझा अनुभव होता.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

पिथौरागढ़- धारचुला हायवेने जीप निघाली! कनालीछीना, मेर्थी, ओगला, जौलजिबी अशी गावं तशी ओळखीचीच. अनेक वेळेस इथे येणं झालं आहे. कडक थंडीमुळे बंद असलेल्या काचांमधूनही बाहेरचा विराट नजारा जाणवतोय! कालीगंगेच्या पलीकडे नेपाळ! जौलजिबीला गोरीगंगा नदीचा पूल ओलांडून गाडीने डावा रस्ता घेतला. इथून पुढेच ती गावं होती. घरूडी, मनकोट, लुमती, चामी अशी जिथे २०१३ च्या पूरानंतर मदत कार्यासाठी मैत्री संस्थेच्या टीमसोबत काही‌ दिवस काम करता आलं होतं. फार वेगळा अनुभव होता तो. एका टप्प्यावर तर एक रौरावता धबधबा केवळ एका फळीसारख्या पुलावरून ओलांडावा लागला आणि मदत कार्यासाठी येऊन मीच इथे अडकतो की काय, असं वाटलं‌ होतं. तेव्हाचे त्या गावांमधले प्रवास, अनेक ठिकाणी झालेली शिबिरं आणि रेशन वाटप आणि पुढे अनेक ठिकाणी धबधब्यांमध्ये वाहणारी नदी ओलांडून केलेले प्रवास! खूप विलक्षण अनुभव होते. अनेक गावांमध्ये नद्यांनी मोठा विध्वंस केला होता. खूप नुकसान झालं होतं. मैत्रीतल्या अनेक जणांनी तर अनेक महिने इथे काम केलं होतं. आता अगदी वेगळ्या निमित्ताने माझं त्याच रस्त्यावरून जाणं होतंय! त्या सगळ्या आठवणी मनात दाटून येत आहेत.


.

.

.

.

जौलजिबी मागे पडलं तसा रस्ता हळु हळु बिघडत जातोय. चामी, लुमती अशी गावं मागे पडली. मदकोटच्या आधी खूप दुर्गम भाग लागला. बाजूलाच खळाळत वाहणारी गोरी गंगा! पण ह्यावेळी पात्र शांत वाटतंय. काही ठिकाणी अगदी अरुंद रस्ता आणि कुठे कुठे रस्त्यावर वाहतं पाणी! थोड्या अंतरानंतर तर रस्ता अगदीच बिकट झाला. इतका की, इथून ट्रक किंवा बससुद्धा सध्या जात नसणार असं वाटतंय. दोन जीप्ससुद्धा कशा बशा एकमेकींना ओलांडत आहेत! काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. डोंगरातून जाऊन नंतर नदी ओलांडून रस्ता पैलतीरावर आला. कदाचित मदकोटनंतर चांगला असेल असं वाटलं होतं. पण रस्ता बिकटच आहे. मी काहीही नाश्ता केला नाही ते बरंच झालं, कारण काही प्रवासी सतत उलटी करत आहेत! खूप वेळाने जीप थोडा वेळ थांबली तेव्हा आसमंत नीट बघता आला. व्वा! हिमालयाच्या किती आत आहे जी जागा!

नदी ओलांडल्यानंतर थोड्या वेळाने परत घाट रस्ता सुरू झाला. नक्की, आता मुन्सियारीपर्यंत सलग चढ असणार. बघता बघता नदी खूप मागे पाताळात राहिली आणि रस्ता वर चढत गेला! अवाक् करणारा परिसर! डोंगरातली छोटी छोटी गावं! आणि शक्य त्या सगळ्या लोकांना व पोचवणारा व त्यांचं सामानही नेणारा जीप ड्रायव्हर! पहाडी गाणी! सत्गडवरून सकाळी ७ ला निघालेली जीप ११ वाजण्याच्या सुमारास मुन्सियारीमध्ये पोहचली! पोट हलकं असल्यामुळे काहीच त्रास न होता पोहचलो. सत्गडच्या नवीनजींच्या ओळखीतून इथल्या एका माणसाची ओळख मिळाली होती. त्या गुप्ताजींना भेटलो. त्यांनी एक चांगला होमस्टे सुचवला. आकाश दर्शनासाठी मोकळी गच्ची आणि अगदी समोर पंचाचुली आणि इतरही हिमशिखरं! वा! शिवाय मुख्य गावातच आहे, त्यामुळे जेवण- चहा जवळच मिळेल. मस्त चहा, नाश्ता आणि गप्पा झाल्यावर त्या सौम्या होमस्टेमध्ये गेलो. दुपारच्या ऊन्हात थंडी कमी वाजतेय. पण रात्री मजा येणार! पण काय ठिकाण आहे हे! अहा हा! आणि बाजूच्याच हॉटेलमध्ये आत गेल्यावर तर अजून सुंदर व्ह्यू मिळतोय! अगदी पंचाचुली शिखरांच्या सत्संगात असल्यासारखं‌ वाटतंय!

मुन्सियारी! पर्यटकांमुळे गजबजलेलं आणि वस्ती वाढलेलं पण तरी छोटसंच गांव! चहु बाजूंनी उंच पर्वत आणि द-या! इथे रात्र खूप लवकर पडणार. म्हणून दुपारी जास्त आराम न करता चार वाजताच नंदा देवी मंदिर बघायला निघालो. इथून साधारण दीड- दोन किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे एक छोटा ट्रेकसुद्धा होईल. अपेक्षेप्रमाणे रस्ता खूपच सुंदर आहे! अगदी हिमशिखरांकडे नेणारी वाट वाटेल असा! शांत रस्ता, दुतर्फा झाडं आणि नजारे! मंदिरामध्येही छान बाग आहे आणि दृश्यं सुंदर दिसत आहेत. मनसोक्त फोटो काढून आणि दृश्यांचा आनंद घेऊन परत निघालो. अंधार पडण्याच्या आत होम स्टेमध्ये पोहचायचं आहे आणि आकाश दर्शनाची सुरूवात करायची आहे! त्याआधी अर्थातच संध्याकाळची शिखरांवरची लालिमासुद्धा टिपायची आहे!

सूर्य डोंगराआड गेल्यावर थंडी वाढायला लागली. दुर्बीण सेट केली. तिथल्या हॉटेलवाल्यांनाही सांगितलं. तेही बघायला येतो म्हणाले. सूर्य मावळताना लालसर होणा-या हिमशिखरांचे फोटो घेतले. आणि साडेपाच वाजता तारे दिसायला लागले! पंचाचुलीच्या बाजूलाच ब्रह्महृदय आणि रोहिणी प्रकटले! नंतर गुरूसुद्धा आला. दोनच दिवसांपूर्वी पोर्णिमा झालेली असल्यामुळे चंद्रही लवकरच आला. पंचाचुलीच्या मागून होणारा चंद्रोदय! अहा हा! कडक थंडीमध्ये काही वेळ आकाश निरीक्षण केलं. खूप अंधुक तारे दिसत आहेत! मोबाईलच्या फोटोमध्ये देवयानी आकाशगंगा स्पष्ट येते आहे! फोटो सुंदर घेता आले! संध्याकाळीच जेवण केलं. रात्रभराच्या टाईम लॅप्सचं सर्व सेटींग करून ठेवलं. थोडा वेळ आकाश दर्शन केलं आणि रात्री ९ च्या सुमारास निद्रा आराधना सुरू केली. पहाटे उठून पहाटेचं आकाशही बघणार आहे. नक्कीच, ह्या कडक थंडीमध्येही आकाश दर्शन करता येणार! आणि आकाश फार सुंदर दिसणार!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 18 फेब्रुवारी 2026.

भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

✪ अंध गायकासोबत विशेष भेट

✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली!
✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स!
✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला
✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद
✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब!

७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता. पहाटे तेजस्वी गुरू, मघा, पुनर्वसू, व्याध, स्वाती, चित्रा छान दिसले! अनेक कृत्रिम उपग्रहसुद्धा दिसत आहेत. हळु हळु पहाट होतेय. दुर्बिणीतून बघणं मात्र खूप कठिण आहे. दुर्बिणीच्या आरशाचं झाकण काढायलाच कष्ट पडले! बोटं गार पडत आहेत. थोडा वेळ दुर्बिणीतून निरीक्षण केलं. उजाडण्याआधी पूर्वेला एक ठळक तारा दिसला. हा शुक्र तर असू शकत नाही! विशाखा नक्षत्राच्या जवळ इतका ठळक तारा नाहीय! हा निश्चितच बूध असला पाहिजे. चक्क अर्धा तास बूध दिसला!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील: https://niranjan-vichar.blogspot.com/2026/02/experiencing-kumaon-himalay... माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल: https://open.spotify.com/show/00vTZSU2qaJE8FwVTHPe6p )


.

.

.

.

पंचा चुली हिमशिखरांच्या मागून उगवणा-या चंद्राचा व्हिडिओ.


शर्मिष्ठा मावळून सप्तर्षी वर येईपर्यंतचा 8 तासांचा टाईम लॅप्स व्हिडिओ.

मुन्सियारीमधली पहिली रात्र छान गेली. अद्याप चंद्र मोठा आहे आणि त्यामुळे थोडा फरक पडतोय. जितके अंधुक तारे अजून दिसले असते ते अजून दिसत नाही‌ आहेत. दुर्बिणीतूनसुद्धा खूप वेगळे असे ऑब्जेक्टस अजून तरी दिसले नाही आहेत. ही कसर फोटोमध्ये मात्र भरून निघतेय. प्रत्येक लाँग एक्स्पोजर फोटोमध्ये उपग्रहांच्या‌ ट्रेल्स येत आहेत. अजून दोन रात्री इथे थांबेन. पहाटेपासून उठल्यामुळे सकाळी परत झोप घेतली. रात्रभरामध्ये मोबाईलमध्ये आलेले फोटो बघितले. चंद्रोदयाचा व्हिडिओ/ टाईम लॅप्स तितका नीट आला नाहीय. आज आणि उद्या परत त्याचा प्रयत्न करेन. थंड पाण्यामुळे सकाळचं आन्हिक आवरणं हा मात्र त्रासाचा विषय ठरतोय! आणि थंडीवर चहाची ऊब!

दिवसा दिवसाच्या दृश्यांचा मनसोक्त आनंद घेतोय. कितीही‌ वेळा बघितलं तरी मन भरत नाही. काय ते उंच पर्वत! डोंगरातली छोटी छोटी गावं! त्यात जाणारे नागमोडी रस्ते! दूरवरून डोंगरातल्या वळणादार रेषा वाटतात! मुन्सियारीच्या जवळ तसं फिरायला खूप आहे. काही ग्लेशियर्सचे‌‌ ट्रेक इथून जवळच सुरू होतात. मुन्सियारीमध्येही काही छान ट्रेक आहेत. खेलिया टॉप हा असाच एक ट्रेक. तो करायची इच्छा आहे. पण तो खूप मोठा आहे- जाऊन येऊन सात- आठ तास जातील. आणि आकाश दर्शनाचं जागरण होत असल्यामुळे दिवसा आराम केला पाहिजे. त्यामुळे हा ट्रेक नाही करता आला. पण मुन्सियारी गावातच जास्त फिरलो. आणि अगदी जवळचे छोटे ट्रेक करतो आहे.

संध्याकाळी एक विशेष भेट झाली. पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या बेरीनागचे अंध गायक- सुंदर बाफिला भेटले. इथे गावात एक जत्रा सुरू आहे. त्यात गाण्यासाठी ते आले आहेत. गुप्ताजींचे मित्र असल्यामुळे त्यांनी ओळख करून दिली. ते माझ्या बाजूच्या रूममध्येच थांबले आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांनी बोलता बोलता सहज म्हणून काही गाणी गायली! अप्रतिम वाटली! त्यांचे बरेच कार्यक्रम व शो झालेले आहेत. दिवसभरात त्यांच्याशी अधून मधून भेट होत राहिली. त्यांचं युट्युब चॅनल आहे. पण आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून अंध व्यक्तीसुद्धा कसा कंप्युटर व मोबाईल वापरू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं. त्याबद्दल त्यांना थोडी माहिती दिली. माझ्या ओळखीच्या व्यक्तींचे अनुभव सांगितले.

दिवसभर हिमालयातल्या दृश्यांचा आनंद घेतल्यावर आता रात्रीच्या आकाशाची ओढ वाटतेय! सूर्य साधारण तीन वाजताच डोंगराआड गेला. हळु हळु थंडी सुरू झाली. पाच वाजता पंचा चुलीचे शिखर लाल व्हायला लागले! आणि साडेपाच पासून रात्र सुरू झाली! तारे प्रकाशित झाले! आज आणि उद्या चंद्र येईपर्यंत चांगला अंधार मिळेल. त्या वेळेत खूप सुंदर आकाश मिळालं! शर्मिष्ठा- सारथी परिसरामध्ये आणि पश्चिमेला श्रवण आणि डेनेब ता-याच्या जवळ आकाशगंगेचा पांढरा पट्टा काही वेळ दिसला! बायनॅक्युलरने तर अप्रतिम पिठुर चांदणं दिसतंय! ढिगाने अंधुक उपग्रह जाताना दिसत आहेत! वा! सातच्या रात्री चंद्रोदयाचा टाईम लॅप्स परत एकदा घेऊन बघितला. पण नीट आला नाही. पण नुसत्या डोळ्यांनी दिसणारं काय दृश्य आहे ते! शिखरांमागून हळु हळु लालसर प्रकाश वर येतो! हळु हळु चंद्राचं टोक वर येतं आणि त्या प्रकाशात शिखर पाठमोरं दिसतं! वा!

असं सात आणि आठ डिसेंबरच्या रात्री मुन्सियारीवरून छान आकाश दर्शन केलं. अखेर आठच्या रात्री शिखरांच्या आड उगवणारा चंद्रही टिपता आला! स्टार ट्रेलचाही छान टाईम लॅप्स घेता आला. रात्री चंद्र थोडा उशीरा उगवत असल्यामुळे तोपर्यंत आकाशही छान बघता आलं. फोटोमध्ये अँड्रोमिडा आकाशगंगाच नाही तर अंधुक अशी ट्रायंग्ल्युलम गॅलक्सी- M33 सुद्धा उमटली! युरेनससुद्धा कृत्तिकेच्या बाजूला फोटोत स्पष्ट आला. मध्ये मध्ये ढग असल्यामुळे टेलिस्कोपिक निरीक्षणं अशी मात्र तेवढी करता आली नाहीत. शिवाय दुर्बिणीने बघताना थंडीमुळे मर्यादाही आली. बायनॅक्युलरने मात्र वेड्यासारखे तारे दिसले.

असं मुन्सियारीमध्ये तीन रात्री मनसोक्त आकाश दर्शन केलं. अगदी सगळी इच्छा पूर्ण केली. टाईम लॅप्स व्हिडिओही मिळाला. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेही दिसणारे पंचा चुली शिखर डोळे भरून बघितले! आता परत जावं लागेल! इथून पिथौरागढ़ला जाण्यासाठी जीपच सोयीची आहे. इथून थलकडे बस जाते, पण तिथून पिथौरागढ़ला जायला फिरून जावं लागेल. दोन वेळेस जीप्स निघतात. काही जीप्स अगदी पहाटे साडेचारला जातात आणि दुस-या काही जीप्स सकाळी ११ ला जातात. मी त्या जीपने जायचं ठरवलं. गुप्ताजींच्या ओळखीने जीपवाल्याशी बोलून ठेवलं. पहाटेचं आकाश दर्शन करून मग टेलिस्कोप पॅक करून ठेवेन आणि मुन्सियारीतच एक ट्रेक करेन. त्यानंतर ११ च्या जीपने निघेन. हे ठरवून आठच्या रात्री उशीरापर्यंत आकाश दर्शन केलं. नंतर ढग आले तेव्हा टाईम लॅप्सचे फोटो लावून निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 20 फेब्रुवारी 2026.


भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास


✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती
✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली
✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं
✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं!
✪ पहाड़ाची नानाविध रूपं!
✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ

९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका सुंदर गाण्यासह जीपमधून बघितलेला नजारा इथे बघता येईल.


.

.

.

.

.

.

.

मुन्सियारी गांव! तालुक्याचं ठिकाण आहे आणि पिथौरागढ़ जिल्ह्यातील जवळ जवळ उत्तरेकडचं सर्वांत मोठं गाव. इथे फिरताना खूप महिला डोक्यावर सिलेंडर घेऊन जाताना दिसत आहेत. इतक्या जास्त की, असं वाटलं की, कदाचित महिन्यातून आजच इथे सिलेंडर मिळत असतील आणि म्हणून त्या नेत असतील. आणि रिक्षा नसल्यामुळे डोक्यावरून नेत असाव्यात. पण नंतर कळालं की, इथे सिलेंडर रोज मिळतो आणि महिला अशाच त्या नेतात. पुढे महिला इतरही मोठं सामान नेताना दिसल्या.

मुन्सियारी गाव फिरलो. छोटी छोटी आणि चौकोनी घरं. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये इथे बर्फवृष्टी होते. त्यासाठी अनेक घरांमध्ये रूम हीटरही असतो. हे गाव तसं सीमेलगत जाणा-या रस्त्यांवर येत नाही. त्यामुळेही कदाचित इथले जवळचे रस्ते इतके सुस्थितीत नाही आहेत. पायवाटेवरून हिमालयाच्या शिखरांचा आनंद घेत मस्त चाललो. छोटे धबधबे दिसले. पायवाटेवर शाळेत जाणारे मुलं भेटले. पहाड़ामध्ये येण्या जाण्याची‌ साधनं कमी असल्यामुळे पायी जाण्याचं आणि मेहनतीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे शक्यतो लठ्ठपणा कमी दिसतो.

पायवाट छोट्या गावांकडे जातेय. रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जातेय. पुढे गेल्यावर पायवाट परत रस्त्याकडे आली आणि येताना मुख्य रस्त्यावरून चालत आलो. रस्त्यावरही शाळेत जाणारे मुलं आणि पालक दिसले. कितीही फिरलो आणि कितीही निसर्ग सौंदर्य बघितलं तरी कमी वाटेल असा आसमंत! परत होमस्टेकडे गेलो आणि पंचा चुलींना न्याहाळत चहाचा आनंद घेतला! जीपचा प्रवास करायचा असल्यामुळे नाश्ता टाळला.

जीप होमस्टेपाशीच मिळाली. फक्त मुनिस्यारीमध्ये सगळ्या लोकांना घरपोच जाऊन घेण्यात आणि पेट्रोल भरण्यात वेळ गेला. त्यामुळे प्रत्यक्ष बाहेर पडायला १२ वाजले. ह्या प्रवासात समोरची सीट मिळाली! त्यामुळे मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओ घेता आले.

पहाड़ी लोकांचा साधेपणा आणि एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती सतत जाणवते. एका महिलेने अगदी सहजपणे जीप ड्रायव्हरकडे मोठी रक्कम दिली आणि पुढे एका गावात द्यायला सांगितली. त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं की, ते काही आधीपासून ओळखीचे नाहीत. पण विश्वासाने तिने पैसे दिले आणि तितक्याच सहजपणे त्याने देतो म्हणून सांगितलं. मुख्य मार्गालगतच्या गावांमध्येही जीपने नंतर सामान पोहचवलं. जीपचा प्रवास खूप सुंदर झाला. खूप सुंदर व्ह्यू मिळाला. पुढे बरम गावात जीप जेवायला थांबली तेव्हाही बाजूच्या गोरीगंगेचं छान दर्शन घेता आलं. वाटेत अनेक वेळा थांबत थांबत गेल्यामुळे आणि जेवणाच्या ब्रेकमुळे पोहचायला उशीर होत गेला. जौलजिबीपासून मोठा रस्ता सुरू झाला. तरीही प्रत्यक्ष सत्गडला पोहचायला ५ वाजत आले.

सत्गडला घरापर्यंत आता कच्चा रस्ता झाला आहे. पण तोही ट्रेकइतकाच सुंदर आहे. लॅपटॉप, बायनॅक्युलर आणि टेलिस्कोप घेऊन हा छोटेखानी १० मिनिटांचा ट्रेक केला. संध्याकाळच्या लाल सूर्यप्रकाशात काय विलोभनीय आसमंत दिसतोय! अर्थात् जाताना वाघाची आठवण आलीच! काही गाववासीही भेटले. अंधार पडण्याच्या थोडं आधी सत्गडला पोहचलो. सामानसह चालल्यामुळे मिळालेली उष्णता लवकरच गेली आणि थंडीचा कडाका सुरू झाला! अशा वेळी चहा खरोखर अमृततुल्य! घराच्या गच्चीतून दिसणारे डोंगर आणि झाडी हळु हळु काळोखात विलीन झाली. तारेही प्रकट झाले! आणि ध्वज मंदिरातला तेजस्वी दिवाही प्रकाशित झाला. चंद्र अजून जास्त उशीरा येत असल्यामुळे रात्री सत्गडमध्येही आकाश खूप छान मिळालं आणि आणखी छान फोटो घेता आले. उद्या ध्वज मंदिराचा ट्रेक करेन आणि परवा परतीचा प्रवास सुरू होईल!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 फेब्रुवारी 2026.






























राजस्थानची रोजनिशी

 

 : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

२०२५ च्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखला होता.

ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली.

जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती.

मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो. त्यांची मुलगी फार लहान असल्यामुळे त्यांनी फक्त जयपूर मध्ये पाच दिवस फिरून परतायचं, तर आम्ही पुढे आणखी 3 दिवस उदयपूर भागात फिरायचं आणि मग निघायचं असा बेत होता.

i1
दिवाळीच्या काळात चमचमते पुणे शहर

पुण्याहून रात्री उशिराचं विमान होतं. त्याने आम्ही जयपूरला मध्यरात्री २ च्या सुमारास पोहोचणार होतो. त्यामुळे रात्री दूरचा प्रवास न करता विमानतळाच्या परिसरातच एक हॉटेल बघितलं, जेणेकरून तेथे पटकन पोहोचून उरलेली रात्र झोप पूर्ण करता येईल. दुसऱ्या दिवशीपासून जयपूर सोडेपर्यंत चार दिवसांसाठी एअरबीएनबी वरून एक घर बुक करून ठेवलं होतं.

विमानतळ रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी प्रीपेड रिक्षा कॅब असे काउंटर टाकलेले असतात. ते प्रवाशांच्या सोयीसाठी की लुटीसाठी असा प्रश्न कधी कधी पडतो. मागे दिल्लीत मला बरा अनुभव होता. इथे मात्र विमानतळाच्या दारापासून अवघ्या दीड किलोमीटर असलेल्या हॉटेल साठी त्यांनी आम्हाला एका सेदान गाडीचे ४५० रु. सांगितले. त्यापेक्षा कमी दरात उबर वरून SUV गाडी मिळाली. समोरच प्रशस्त पार्किंग आणि तिथे कॅब मिळणेसुद्धा सोयीस्कर होते.

आठवड्याभराचे सामान, अर्धवट झोपेतली मुले सोबत असल्यामुळे कॅब आवश्यक होती. एरवी हलके सामान असताना एवढे अंतर चालून जायला काही वाटत नाही. २–४ मिनिटांत हॉटेलला पोहोचलो आणि झोपलो. पहिल्या दिवशी सर्वांची झोप पूर्ण करण्यावर भर दिला. निवांत उठलो, आवरले, नाश्ता करून आधी त्या एअर-बीएनबीवाल्या घरी सामान नेऊन टाकले आणि मगच फिरायला बाहेर पडलो.

गलताजी मंदिर

पहिले ठिकाण होते गलताजी मंदिर, यालाच मंकी टेम्पल म्हणूनही ओळखले जाते. याला कारण या परिसरात प्रचंड संख्येने असलेली माकडे.

i2

i3

इथे गलताजी नावाच्या महाराजांचं, मारुतीचं, राम लक्ष्मण जानकी अशी छोटी छोटी लागून काही मंदिरे आहेत. दोन डोंगरांच्या मधोमध असलेल्या खिंडीत ही मंदिरे आहेत आणि इथून वाहणाऱ्या प्रवाहाला अडवून दोन मोठे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळे असे स्नानकुंड आहेत. तिथे स्नान करून फार पुण्य मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे, आणि त्यामुळेच फार गर्दी सुद्धा. आणि ओघानेच थोडा गचाळ राडासुद्धा. असो.

i4

मंदिराकडे जाताना राजस्थानी शैलीचे सुंदर वाडे आहेत, कुंडाच्या आजूबाजूचे बांधकाम फार सुंदर आहे. वर सांगितलेली मंदिरे ही कुंडाच्या बाजूने पायऱ्या वर चढून गेल्यावर आहेत. तिथून आणखी पुढे गेल्यास टेकडीवर एक सूर्य मंदिर आहे, तिथून जयपूर शहराचे दृश्य छान दिसते असे समजले. पण ऊन फार असल्यामुळे, आणि जयपूर शहराच्या दृश्यासाठी प्रसिद्ध असलेले नाहारगड हे आमच्या यादीत असल्यामुळे आम्ही आणखी वर जाणे टाळले.

i5

i6

हे मंदिर शहराच्या फार बाहेर आहे, जाताना आम्ही उबर केली होती, पण रस्ता पाहून येताना पटकन गाडी मिळणे अवघड आहे अशी आमची चर्चा चालूच होती, ती ऐकून त्या ड्रायवर ने पुढे कुठे जायचे असे विचारले. आम्ही यापुढे गोविंद देव मंदिर ठरवले होते ते सांगितले. ते उबर वर टाकून किती होतात ते त्याला सांगितले, तो आणखी १५० घेऊन तिथेच आमच्यासाठी थांबायला तयार झाला.

त्याच कॅबमध्ये बसून आम्ही गोविंद देव मंदिराकडे निघालो. हे मंदिर सिटी पॅलेसच्याच परिसरात होते. इथे येताना जयपूरला पिंक सिटी असा लौकिक देणारा भाग सुरू झाला.

पिंक सिटी

प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड हे १८७६ च्या सुमारास भारतात येणार होते, जयपूरला भेट देणार होते. हल्ली जशी राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट असली की रस्ते आणि परिसराची डागडुजी करण्याची लगबग उडते तशी झाली. तेव्हाच्या जयपूरच्या राजांनी सगळं शहर रंगवून काढलं.

i7

खरं पाहता हा रंग गुलाबी नाही. अरिजितच्या गाण्यामधला गेरूआ आहे. त्याला गुलाबी का म्हटलं गेलं त्याची दोन तीन कारणं सांगितली जातात.

-

  • एक म्हणजे हा रंग इंग्रजांसाठी फारसा परिचित नव्हता. त्याला इंग्रजीमध्ये नेमका शब्द मिळाला नाही, त्यामुळे टेराकोटा पिंक किंवा नुसताच जवळपास चा म्हणून पिंक असा शब्द तेव्हाच्या पत्रकारांनी वापरला आणि तोच रूढ झाला.
  • किंवा तेव्हा एडवर्ड सोबत आलेला कारकून कलर ब्लाइंड होता त्यामुळे त्याला हा रंग नेमका समजला नव्हता आणि त्याने जो लिहिला तोच रंग रूढ झाला.
  • आणखी एक कारण म्हणजे राजाच्या मनात गुलाबी हाच रंग होता, आतिथ्याचे प्रतीक म्हणून तो रंग निवडला होता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो रंग बनला नाही,
    जे सामान वापरलं गेलं त्यातून रंगकाम झाल्यावर हीच छटा दिसू लागली. तरीही गुलाबी रंगाचा बेत असल्यामुळे तोच शब्द वापरला गेला असं ही सांगतात.

यातलं कुठलंही किंवा आणखी काही कारण असो, तेव्हापासुन जयपूरची गुलाबी शहर अशी ओळख निर्माण झाली हे मात्र खरं. हीच ओळख जपण्यासाठी नंतर हा रंग तेव्हापासुन आजपर्यंत वापरला गेला. जे जुनं शहर आहे, त्याला तटबंदी होती आणि सर्व दिशांना वेगवेगळ्या नावांचे दरवाजे आहेत. त्यामुळे या भागाला चार-दिवारी असंही म्हणतात. या भागात सर्व इमारतींना हाच रंग वापरला जावा असा राजाने कायदाच आणला होता. आजही सर्व इमारतींची दर्शनी बाजू आणि किमान पहिला मजला याच रंगाचा आहे. कोणी वर वाढीव बांधकाम केलं असेल तर काही ठिकाणी वेगळा रंग दिसतो, पण सगळीकडे उठून मात्र हाच रंग दिसतो.

याच भागात बापु बाजार, जोहरी बाजार, त्रिपोलीया बाजार अशा अनेक प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. त्यातली सर्व दुकाने याच रंगात आहेत. दुकानांच्या फलकासाठी सारखीच जागा आहे आणि बहुतांश दुकानांची ती जागा सारख्याच पद्धतीने रंगवली आहे. नव्या पद्धतीची इलेक्ट्रिकल यंत्रणा फार कमी दुकानांनी वापरली आहे. त्यामुळे इथे अगदी जुन्या काळातल्या बाजारात आल्यासारखंच वाटतं.

मंदिराचे पट

गोविंद देव मंदिरात पोहोचल्यावर कळलं कि हे मंदिर ५ वाजेपर्यंत बंद होतं. राजस्थानातल्या सर्व मंदिरात हा एक प्रकार होता. दिवसात काही वेळा इथे पट म्हणजे देवासमोरचे पडदे काही वेळा आरती नंतर चालु बंद होतात. पट बंद म्हणजे दर्शन बंद. इथे त्यांनी देवाची सकाळची उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, दुपारच्या वामकुक्षीच्या वेळा, रात्रीचे जेवण, रात्रीची झोप अशा सर्व पद्धती कटाक्षाने पाळलेल्या दिसतात.

परंपरा म्हणुन चांगलंच म्हणायचं. स्थानिक लोकांना त्या वेळा माहित असतात, पण बाहेरून फिरायला आलेल्यांचे मात्र हेलपाटे होतात. आधीच जवळपासच्या जागा, तिथे अधेमधे फिरणं, खाणं पिणं याच्या वेळा सांभाळाव्या लागतात. लहान मुलं किंवा ज्येष्ठ सोबत असतील तर अधिकच. आणि त्यात हि भर.

चोखी धानी

आम्हाला इथून पुढे चोखी धानीला जायचं होतं. ते फक्त संध्याकाळीच असतं आणि ते शहराबाहेर होतं, तिथे जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे आम्ही इथे तासभर दर्शनासाठी थांबायचं मग निघायचं ठरवलं असतं तर बराच वेळ गेला असता. त्यामुळे आम्ही सिटी पॅलेस करायला येऊ तेव्हा पुन्हा प्रयत्न करू असा विचार करून चोखी धानीला निघालो.

हि जागा सुद्धा शहराबाहेर असल्यामुळे कॅब ड्रायवरनेच आम्हाला आधीच्या ड्रायव्हरसारखीच मी तुमच्यासाठी थांबतो अशी ऑफर दिली. गलताजी आणि चोखी धानी दोन्ही ठिकाणी मला असं वाटलं कि ओला उबर मिळायला थोडी अडचण होऊ शकते हे खरं, पण काही वेळ थांबण्याची तयारी असेल तर ओला उबर किंवा स्थानिक ऑटो, टमटम असे काही पर्याय मिळूही शकतात.

i8

चोखी धानीमध्ये १००० रु., १२०० रु., १३०० रु. प्रति व्यक्ती असे काही तरी ३ पर्याय आहेत. त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला फोटोसहित माहिती आणि अद्ययावत किमती मिळू शकतील. हे शुल्क म्हणजे प्रवेश आणि निवडलेल्या पर्यायात अमर्यादित जेवण असे आहे. आत ढीगभर आणखी कुल्फी, पाणीपुरी, मसाला दूध, कॉर्न चाट, वेगवेगळे गेम्स असे अनेक काउंटर आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी २०, ३०, ४०, ५० अशा प्रमाणात खर्च होतोच.

त्यापैकी १००० वाला पर्याय म्हणजे, राजस्थानी थाळी, जी भारतीय बैठकीत पंगतीत मिळते. दुसरा मल्टीक्युझिन पर्याय नेहमीसारख्या रेस्टारंट मध्ये असतो तसा प्रकार. आणि एक रॉयल प्रकार ज्यात थोड्या आणखी चकचकीत अशा दालनात चांदीच्या ताट वाटीमध्ये जेवण असे पर्याय आहेत. यातले दुसरे दोन पर्याय आपल्याला पुण्यात किंवा महाराष्ट्रातही सहज मिळतात. त्यामुळे इथे येऊन राजस्थानी खेड्याचा फील पहिल्या पर्यायातच होता, त्यामुळे आम्ही तोच निवडला.

यात फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने आपल्याला ६.३०, ७.१५ अशा वेळा मिळतात. त्यावेळेस गेलो तर आपल्याला प्राधान्य मिळते. उशिरा उशिरा प्रचंड गर्दी होत जाते आणि वाट बघावी लागते. तिथे प्रचंड गर्दी असतेच, परंतु परिसर अतिशय विस्तीर्ण आहे त्यामुळे अगदी गजबज किंवा धक्काबुक्की झाल्यासारखं वाटत नाही. गर्दी आरामशीर पसरते. आम्ही गेल्यावर थोडा वेळ स्टॉल्स मध्ये टाईमपास केला आणि आमच्या वेळेत ७.१५ वाजता जेवायला गेलो. लगेच नंबर लागला आणि निवांत जेवण झालं.

i9

तिथे एक एक विभाग २-३ पारंपरिक राजस्थानी वेशभूषा असलेल्या वेटरकडे सोपवलेले असतात. ते सर्व पदार्थ अगदी हसत खेळात अगत्याने, आग्रहाने वाढतात. काही पदार्थ खाण्याची पद्धत कुस्करून, तूप घालून अशी जी काही असेल ती सांगतात आणि तशा पद्धतीने खाऊन बघण्याचा आग्रह करतात. ज्यांनी आपल्याकडे सुद्धा थाळी रेस्टोरंट मध्ये अशी सेवा घेतलेली असेल त्यांनी हा अनुभव घेतला असेलच. पण अशा ठिकाणी पहिल्यांदाच आलेले किंवा राजस्थानी पदार्थांची अजिबात ओळख नसलेले लोकही येतात, त्यामुळे अशी माहिती मिळणे त्यांच्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे. सर्व पदार्थ आम्हाला आवडले, चव छान होती.

एवढी सेवा दिल्यावर त्यांना टीप देणे अनिवार्य नसते, पण त्यांची अपेक्षा असते आणि ते राम राम सा म्हणत दोन तीनदा व्यक्त करतात.

हेच इथे असलेल्या सर्व कलाकारांचेही आहे. त्यांनाही टीप ची अपेक्षा असते. इथे मेहेंदी काढून घेणे, राजस्थानी लोककला, नृत्य, मटके डोक्यावर ठेवून तोल सांभाळून नाचणे, आगीचे खेळ, जादूगाराचे खेळ, कठपुतळी असे अनेक सादरीकरण आपण निःशुल्क बघू शकतो. त्यासाठी त्या कलाकारांना थोड्या थोड्या अंतरावर मंडप बांधून दिलेले आहेत. दर १०-१५ मिनिटांनी ते आजूबाजूला थोडी गर्दी जमली कि काही मिनिटांचा खेळ सुरु करतात. मागे ३-४ वादक, एखादा गायक बसलेले असतात, ते गाणी म्हणतात आणि त्या तालावर मध्यभागी नर्तक किंवा आगीचे खेळ करणारे कलावंत आपली कला सादर करतात.

पण प्रत्येकच ठिकाणी टीप देणे मध्यमवर्गीय मंडळींना सोपे नाही. त्या कलाकारांची मेहनत दिसून येते. दर १५-२० मिनिटात नव्या खेळाला सज्ज व्हावे लागते. रोज रोज हे करून काही जणांच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो, किंवा एकसुरीपणा दिसतो. ज्यांचा स्वभावच हसतमुख असतो असे कलाकार तरी हसत कला सादर करतात.

एखाद दुसऱ्या खेळात ठीक आहे, पण आपल्याला प्रवेशालाच १००० किंवा अधिकचा चुना लागलेला असतो. पाण्याच्या बाटल्या, फिरत फिरत काही मुलांचे गेम्स, मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी, काही आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी अशा अनेक ठिकाणी आपला खिसा रिकामा होत असतो. त्यांना १००० रुपयांची थाळी खाणारे लोक श्रीमंत वाटत असतील, आणि ज्यांच्यासाठी १००० रुपये चिल्लर आहे असेही लोक तिथे नक्कीच येऊन जात असतील. पण आपण इतकी वारेमाप दौलतजादा करण्याइतकेही मालदार नसतो. त्यामुळे २-४ खेळ बघितले कि पुढे आपला हात आखडता होतो. प्रत्येक सादरीकरणानंतर बक्षीस मागणे हि त्यांची मजबुरी, आणि आपल्या मर्यादेबाहेर त्यांच्याकडे कानाडोळा करणे हि आपली मजबुरी.

इथे सादर होणारे खेळ चांगले आहेत. कुठलंही सादरीकरण अगदी अत्युच्च दर्जाचा असतं असं नाही, पण राजस्थानमध्ये येऊन इथल्या संस्कृती, खेडेगावांची तोंडओळख करून घेत, इथल्या विविध कला एका ठिकाणी काही तासात अनुभवायला मिळते. सर्व लोक आपापल्या कुटुंब मित्रपरिवारासोबत मजा करायला आलेले असतात. संध्याकाळी आल्हाददायक वातावरण असतं त्यामुळे तिथे वेळ छान जातो. महागडं मात्र नक्कीच आहे. त्यांनी प्रवेश शुल्कात कुल्फी, मसाला दूध असे जे काही अधिकचे पर्याय आहेत तिथे एक कुपन देऊन एकदा निशुल्क आणि कोणाला अधिक हवे असेल तर सशुल्क असे करायला हरकत नाही. पण एवढी लूट असूनही तिथे होणारी गर्दी पाहता ते एवढे दिलदार होतील असे वाटत नाही.

i10

इथेच त्यांनी हल्दी घाटीच्या लढाईचा दिखावा, भूलभुलैया, फोटो काढण्यासाठी चिक्कार प्रॉप्स, बनारसच्या घाटाची प्रतिकृती आणि तिथे संध्याकाळी दोनदा गंगा आरती असे अनेक मनोरंजक प्रकार केलेले आहेत. राजस्थानी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने आहेत.

राजस्थानच्या स्थानिक लोकांना किंवा राजस्थानमध्ये या आधी येऊन गेलेल्या लोकांना इथे काही नावीन्य वाटणार नाही, किंवा पैसे वसुल होत आहेत असे वाटणार नाही. पहिल्यांदा आलेल्यांना छान अनुभव मिळेल.

i11

तर इथे भरपेट जेवण आणि मनोरंजनाचा आस्वाद घेतल्यावर आमचा दिवस संपला. पहिल्याच दिवशी असं जोरदार मनोरंजन करून मात्र आम्ही मुलांच्या दृष्टीने थोडी चुक केली असंही वाटून गेलं. त्यांच्या दृष्टीने हि जयपूरमधली सर्वोत्तम जागा होती. कदाचित ट्रीपच्या शेवटच्या दिवशी क्लायमॅक्स सारखी संध्याकाळ इथे घालवणे आणखी उत्तम झाले असते. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या. आमच्या ट्रीपची सुरुवात तर नक्कीच जोरदार झाली.

क्रमशः ।

हा लेखात टाकायचा राहून गेला.
https://youtube.com/shorts/UY36Wkc0ChU

२ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल.

प्याज कचोरी

जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले. मुलांचं आणि आमचं आवरे आवरेपर्यंत पार्सल येऊन त्यावर ताव मारून झाला.

i1

मोठ्या शहरात तुम्हाला तिथले खास खाद्यपदार्थ खाऊन बघायचे असतील पण कधी तशा जागी प्रत्यक्ष जाणे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात बसवता येत नसेल तर हि एक चांगली सोय आता झालेली आहे. अर्थात काही पदार्थ हे तिथेच खाण्यात मजा आहे. पाणी पुरी, डोसे असे पदार्थ घरी मागवण्यात तेवढी मजा नाही.

प्याज कचोरी मस्त होती. गंमत म्हणजे त्यात कांद्यापेक्षा बटाटा जास्त होता. आपण समोश्यात भरतो काहीसं त्या प्रकारचं सारण होतं, पण वेगळं होतं. आम्ही समोसासुद्धा मागवला होता त्यामुळे तेच सारण भरून फक्त वेगळे आकार काढले असं नव्हतं. आपल्याकडे मिळतात त्यापेक्षा वेगळीच होती कचोरी. नाश्ता अपेक्षेपेक्षा जरा गच्च झाला.

सिटी पॅलेस

त्यानंतर आम्ही भटकंतीची सुरुवात केली सिटी पॅलेस मधुन. सिटी पॅलेस आणि राजघराण्याची मालकी असलेल्या आणखी काही वास्तु आणि स्मारकांचे तिकीट तुम्ही एकत्र घेऊ शकता. ते किंचित स्वस्तही पडतं आणि मुख्य म्हणजे पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहायचे कष्ट वाचतात. असंच जयपूरमधल्या इतर सरकारी व्यवस्थापन असलेल्या आणखी ३-४ गोष्टींचं एक संयुक्त तिकीट आहे आणि त्याची एक ऑनलाईन वेबसाईट आहे. ती अत्यंत फालतु आहे. मी आणि समीर आम्ही दोघांनी बरेचदा ऑनलाईन तिकीट काढण्याचे प्रयत्न केले, काही प्रयत्नांनंतर पेमेंटपर्यंत गाडी पोहोचली आणि आमच्या खात्यातुन पैसे कटूनही तिकीट मात्र निघालंच नाही. ते कटलेले पैसे ट्रिप संपल्यावर कधीतरी आम्हाला परत मिळाले. तोपर्यंत जीवाला घोर होता कारण आम्ही ६ तिकिटे एकत्र काढत होतो.

i2

थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जयपूरच्या कुठल्याही पर्यटन स्थळी गेलात तर तिथे तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढणे आणि ते काढताना संयुक्त तिकीटाची चौकशी करून ते समक्ष घेणे उत्तम. एका ठिकाणी रांगेत जावे लागेल, पण हे पैसे कटून ते परत येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा बरं.

सिटी पॅलेसला तिकीट खिडकीवर जे कर्मचारी होते त्यांना तिकिटे विकण्यात जराही रस दिसत नव्हता. अतिशय कंटाळवाण्या सुरात एक एक वाक्य बोलायला जड होत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्याकडून संयुक्त तिकिटांची माहिती घेऊन ते घेणे हे एक काम कसेतरी पार पडले. तिथे एक अत्यंत महागडे (जवळपास ४००० प्रत्येकी) तिकीट सुद्धा आहे, त्यात तुम्हाला इतर सामान्य पर्यटकांना मिळत नाहीत अशा महालाच्या आणखी अंतर्गत दालनांमध्ये जाण्याची परवानगी मिळते आणि शाही परिवार उपलब्ध असेल तर त्यांनाही भेटायची संधी मिळते असे ऐकले.

जयपुर, उदयपुर दोन्ही ठिकाणच्या राजांनी मोठमोठे महाल बांधले, ते वाढवत नेले. स्वातंत्र्यानंतर त्यांचे राज्य तर खालसा झाले, परंतु त्यांना हे महाल आणि काही मोठमोठ्या खाजगी मालमत्ता मात्र तशाच ठेवता आल्या. त्यांना सुरुवातीला पेन्शन मिळत असे, पण इंदिरा गांधींच्या काळात तीही बंद झाली. पर्यटन वाढले तसे त्यांनी आपल्या या वास्तुंचे रूपांतर संग्रहालय, स्मारक, आलिशान हॉटेल अशा गोष्टींमध्ये केले आणि आज हेच त्यांच्या उतपन्नाचे एक प्रमुख स्रोत आहेत.

i3

सिटी पॅलेसला आम्ही गाईड घेतला. जवळपास सर्व ठिकाणी गाईडची सेवा ठराविक दराने उपलब्ध आहे. तुमच्या समूहात किती लोक आहेत या नुसार गाईडची फी ठरते. शक्यतो लहान मुलांना तुम्ही स्वतः मोजु नका, मोठ्यांचा आकडा सांगा. त्यांना एखाद दुसऱ्या मुलाकडे पाहुन उंचीनुसार वाटले कि त्यांना सुद्धा पकडावे तर तशी बोलणी करता येते. आम्हाला सहसा ४ मोठे पकडुन ४००-५०० रुपये लागत होते.

एक दोन ठिकाणी आम्ही गाईड नाही घेतला, त्याबद्दल पुढे लिहीनच. पण जिथे जिथे घेतला तिथे एक अपवाद वगळता आम्हाला गाईड सोबत घेणे योग्यच वाटले. काही मंडळी हल्ली अशा ठिकाणी फक्त फोटो काढायला, रील बनवायला येतात आणि जागेबद्दल, इतिहासाबद्दल काही न जाणून घेता पुढे जातात. इतिहास तुम्ही वाचुही शकता, पण सर्वांनाच तेवढा रस नसतो. सरावलेल्या गाईडला कुठल्या ठिकाणी काय सांगायचे, किती बोलायचे, सर्वसाधारणपणे लोकांना कुठल्या गोष्टी आवडतात, कुठे जास्त कुतूहल वाटते, हे माहित असते. ते त्यांच्या ठराविक वेगाने बरोबर तासाभरात तुम्हाला छान सफर करवुन आणतात. वाचनाची आवड असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनाच इतिहासाची एक छोटी ओळख होते, ज्याला काही थोडीफार माहिती असेल त्याची गाईड सोबत रंजक चर्चाही होऊ शकते.

जयपुर हे शहर अठराव्या शतकात राजा सवाई जय सिंग (शिवरायांच्या इतिहासातल्या मिर्झा जयसिंग यांचे वंशज) यांनी वसवले. आमेर ही त्यांची आधीची राजधानी होती. तिथे वाढती लोकसंख्या आणि पाण्याची कमतरता या कारणामुळे त्यांनी तिथुन काही अंतरावर असलेल्या जागेत हे शहर वसवले. नव्याने वसवल्यामुळे इथे त्यांना बऱ्यापैकी नियोजन करणे शक्य झाले. इथला महाल हा त्यांच्या वंशजांनीच वाढवत वाढवत आपल्याला दिसतो त्या स्वरूपात आणलेला आहे.

i4

इथे सुरुवातीला एका संग्रहालयात आम्ही फिरून आलो. राजवंशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वापरलेली उंची वस्त्रे, रेशमी, सोन्याचा मुलामा असलेले कपडे, त्यांची हत्यारे, त्यातही सोने चांदीच्या मूठ असलेल्या तलवारी, भाले, त्यांच्या मनोरंजनाची साधने इत्यादी गोष्टी होत्या. त्यापैकी एका राजाची उंची कमी आणि जाडी अत्यंत जास्त असं असल्यामुळे त्यांचे कपडे फारच वेगळ्या आकाराचे होते.

i5

i6

मध्ये एका दालनामध्ये सूक्ष्मचित्र, जयपुरी साड्या आणि शाली रजया वगैरे, अत्तरे असे बनवणारे कलाकार कारागीर बसले होते. याला ३६ कारखाना असं नाव होतं. जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित असलेले पिढीजात कलावंत, ज्यांनी पूर्वी राजांसाठी अशा गोष्टी बनवल्या असतील, आज त्याच गोष्टी त्या सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि राजघराण्याने त्यांना हि जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती गाईडने दिली. राजाश्रयाने इथली कला किती बहरली हे तर आम्ही ठिकठिकाणी पाहतच होतो.

i7

i8

i9

i10

त्यानंतर आम्ही महालाच्या २-३ भागांमध्ये फिरलो. वेगवेगळ्या प्रसंगी आणि जमलेल्या संख्येनुसार जिथे दरबार किंवा सभा भरत असे अशा जागा होत्या. तिथे एका ठिकाणी महालाच्या मधोमध अशी मोकळी जागा होती जिथे चार दिशांना चार दरवाजे होते. चारही दरवाजांवर खूप सुंदर रंगकाम केलेले होते. राजा प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या दाराने प्रवेश करत असे. हौसेला अंत नसतो. इथल्या राजांच्या लहरी आणि ऐशो आरामाचे प्रकार पाहुन थक्क व्हायला होतं.

i11

i12

पुढे एक चांदीची महाकाय घागर पाहिली. याची चांदीचे सर्वात मोठे पात्र असा विश्वविक्रम म्हणून नोंद झालेली आहे. ब्रिटिशांच्या काळात इथल्या एका राजाला इंग्लंडला जायचे होते. तो अत्यंत धार्मिक होता, फक्त गंगाजलानेच अंघोळ करत होता म्हणे. तिकडे जाऊन कसं हे करता येईल यासाठी हे पात्र खास बनवले गेले. या घागरीत गंगाजल भरून ते जहाजात घेऊन राजा इंग्लंडला गेला. त्या काळात भारतीय राजांची छानछोकी कुठल्या स्तरावर गेली होती याचा यावरून अंदाज येतो.

i13

जयपुरमध्ये राहणारा राजा धार्मिक आहे म्हणुन तिथे गंगाजल मागवुन रोज फक्त तेच वापरतो. म्हणजे त्याच्याच राज्यातले इतर लोक, भारतात राहणारे इतर लोक धार्मिक नाहीत का? धार्मिक असण्याचा संबंध आपल्या वैयक्तिक आचरणाशी आहे कि आपल्याकडे असलेला पैसा अडका वापरून, इतरांना राबवुन त्याचा दिखावा करण्यात आहे? राजाला गंगाजल न्यायचंच होतं तर साध्या ५००-१००० घागरी घेऊनही नेता आलं असतं. परंतु एवढी नजरेत भरणारी महाकाय आणि तीही चांदीची घागर नेण्याचा हेतु धर्मपालन कि आपल्या धर्माचं स्तोम दाखवुन इतरांसमोर प्रदर्शन? आणि हे सगळं बघणारे इंग्रज याचा कसा विचार करत असतील? आपल्या धर्म आणि संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात काय प्रतिमा तयार होत असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. असो.

शेवटी असे दालन पाहिले जिथे स्वातंत्र्यानंतर जयपूरच्या राजांच्या भेटीस सरदार वल्लभभाई पटेल आले, आणि यांच्यासमक्ष जयपूर भारतात विलीन झाले. तेव्हा त्यांना राजाच्या समान मानाचे आसन देण्यात आले होते. तेव्हा जी बैठक व्यवस्था होती, ती तशीच जपुन ठेवली आहे.

i14

इथे आजूबाजूला जयपूरच्या अनेक पिढ्यातल्या राजांची चित्रे आणि छायाचित्रे आहेत. त्यापैकी एक राजे असे होते, ज्यांनी एकोणिसाव्या शतकात आपल्या आवडीची कॅमेरा आणला होता. त्यांनी हौस आणि सराव म्हणुन आपल्या दरबारातल्या अनेक माणसांची छायाचित्रे काढली होती. आज त्या माणसांना नावाने ओळख नसली तरी भारतात काढली गेलेली अगदी सुरुवातीची छायाचित्रे म्हणुन आजही ते अनामिक दृश्य स्मृतीत आहेत. हे राजेही भारतातले सुरुवातीचे छायाचित्रकार असावेत.

i15

इथल्या शिल्प, चित्र आणि सर्वच रंगकामांमध्ये फार सुंदर बारकावे असतात. उदाहरणार्थ महालाच्या प्रवेशद्वारापाशी असलेले हे छोटेसे संगमरवरी हत्ती पहा.

i16

आता या हत्तीवर बसलेला माहुत सुद्धा किती बारीकीने बनवलाय बघा. त्याची पगडी, त्याची दाढी, सगळं सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.

i17

मध्ययुगीन राजस्थानात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या पगड्या आणि पागोटे. यातले काही ग्रामीण भागात अजुनही वापरात आहेत.
i18

इतर छायाचित्रे

i19

i20

i21

i22

i23

जंतर मंतर

सिटी पॅलेसच्या समोरच जंतर मंतर नावाचं स्थळ आहे. या भागातच (सिटी पॅलेस आणि चार दिवारी) मुख्य पर्यटन स्थळे असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक रिक्षावाले सतत फिरत असतात. तिथे तुम्ही शेअरिंग बेसिस वर इथुन तिथे जाऊ शकता किंवा तेच तुम्हाला आम्ही हि हि स्थळे फिरवुन आणतो असं पॅकेज देऊन सुद्धा ठरवायचा पर्याय देतात. हा भाग छोट्या रस्त्यांचा आणि गल्लीबोळांचा आहे त्यामुळे इथे कॅब करून अडकण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे. तुम्ही कुठल्या वेळी तिथे पोहचुन सुरुवात करत आहात, किती वेळ शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही हा निर्णय करू शकता. माझ्या मते जयपूरच्या अंतर्गत फिरण्यासाठी रिक्षा आणि काही बाहेरची ठिकाणे करण्यासाठी कॅब हा चांगला पर्याय आहे.

जंतर मंतर या नावावरून हल्ली आपला समज काही तांत्रिक मांत्रिक गोष्टींची किंवा जादुटोण्याची जागा असा होऊ शकतो. जंतर हा यंत्र या शब्दाचा अपभ्रंश आहे, मंतर हा मंत्र या शब्दाचा. जंतर मंतर हे खगोलशास्त्राशी संबंधित भव्य आकाराची यंत्रे असलेले ठिकाण आहे. इथे मंत्र हा शब्द आपले देवाचे मंत्र या अर्थाने नाही तर खगोलीय गणिते करताना वापरलेली सूत्रे असा आहे. तुम्ही वैदिक गणिताशी परिचित असाल तर त्यात पाहिले असेल. त्यात गणिताच्या संकल्पना आणि सूत्रे सुद्धा श्लोक किंवा मंत्राच्या स्वरूपात लिहिलेली आहेत.

i24

i25

i26

जयपुर शहर वासवणाऱ्या राजाला स्वतःस खगोल, ज्योतिष या विषयांमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी भारतात तीन शहरात जंतर मंतर बनवले. इथे सूर्य प्रकाश ज्या कोनात येतो त्यावरून वेळ समजेल, राशी, नक्षत्र वगैरे समजतील अशी यंत्रे आहेत. आधी ती यंत्रे छोट्या आकाराची बनवुन चाचणी केली गेली आणि मग त्याच्याच बाजूला मोठ्या आकाराची यंत्रे बनवली गेली. ज्योतिषशास्त्री या गोष्टी आकडेमोड करून मांडु शकतात, पण इथे ते अगदी सुलभ होते. इथे उजेड असतानाच जायला हवे तर आपण गाईड घेऊन या गोष्टी उत्तम रित्या समजावुन घेऊ शकतो. अशा ठिकाणी येऊनही या ठिकाणाचा फक्त फोटोसाठी पार्श्वभूमी म्हणुन वापर करून जाणारे लोक येतातच.

i26

i27

i28

i29

इथल्या राजांच्या छानछोकीसोबतच कलाकुसर, छायाचित्रण, स्थापत्य, खगोल, ज्योतिष अशा विविध विषयांमधील आवड, त्यावर अभ्यास आणि त्याच्या विकासासाठी सढळ हस्ते केलेली मदत, असे विविध पदर समोर येत होते.

जंतरमंतर मध्येसुद्धा कठपुतळी कार्यक्रम एका कोपऱ्यात चालु होता. चार लोक जमले कि एक गाणे सादर करून मग त्यांना बक्षीस मागणे, हि पद्धत इथे बऱ्याच ठिकाणी आहे.

i30

बाहेर पडल्यावर आम्ही कुल्फी घेतली. त्याचा विशेष उल्लेख यासाठी, कि त्यांची देण्याची पद्धत अनोखी होती. कुल्फीच्या काडीला खालच्या बाजूने एक कागदी डिश मधोमध छिद्र करून वर सरकवुन त्याने दिली. याचा फायदा असा कि कुल्फी खाताना बऱ्याचदा जे ओघळ हातावर येतात ते रोखण्यासाठी हा एकदम साधा मस्त उपाय वाटला.

i31

हवा महल

जंतरमंतर नंतर आम्ही हवा महलला गेलो. हि जागा आजकाल प्रचंड लोकप्रिय आहे. याच्या आत काय आहे त्यासाठी नसून ती बाहेरून अतिशय सुंदर दिसते त्यामुळे. हल्ली लोक इंस्टाग्रामेबल प्लेसेस अशा रिल्स बनवतात, तशा जागा शोधून येतात, त्यात हि जागा टॉपला आहे.

i32

i33

हि जागा सिटी पॅलेस च्याच एका बाजूला आहे आणि मुख्यतः राणी आणि राजवंशातल्या स्त्रियांसाठी हा महाल बनवला गेला होता. याची जी दर्शनी बाजू लोकप्रिय आहे त्याचे वैशिष्टय म्हणजे अनेक मजले एकावर एक असलेले सुंदर सज्जे आणि खिडक्या. इतक्या खिडक्या असल्यामुळे याचे नाव हवा महल पडले असावे.

इथे फार काही ऐतिहासिक घटना किंवा रोचक गोष्टी नाहीत. इथे गाईड फक्त राणी इथून जात असे, तिथून खाली बघत असे, राणीला सर्व दिसत असे पण राणी कोणाला दिसत नसे, किंवा अमुक काच इकडून आली, तमुक माणके तिकडून आली अशा प्रकारची माहिती सांगतो.

i34

i35

अगदी ह्याच गोष्टी आमेरच्या किल्ल्यामधील महालात सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही तो बघुन येथे आलात किंवा तिकडे जाणारच असाल तर इथे गाईड नाही घेतलात तरी चालेल.

i36

i37

i38

इथल्या बहुतांश सर्वच गाईडला तुम्हाला कुठल्यातरी दुकानात न्यायचंच असतं. त्यांचं कमिशन किंवा एक ठराविक फी असणार त्यामागे. पण इथल्या गाईडने कहर केला. आम्हाला हवा महल आतुन पाहुन झाल्यावर त्याची बाहेरची प्रसिद्ध असलेली बाजु बघायची होती. त्याच्या अगदी समोरच एक टॅटू कॅफे नावाचा कॅफे प्रसिद्ध झालेला आहे. तिथे मुख्य आकर्षण हवा महालाचा व्ह्यू तर आहेच पण तिथले खाद्यपदार्थही छान असल्याचा फीडबॅक होता. तिथे जायचं होतं. संध्याकाळी तिथेच काही तरी खायचा आमचा बेत होता. तसं मुलांनाही सांगुन ठेवलं होतं.

या गाईडने मात्र परस्पर ओळखीची रिक्षा ठरवुन एक दीड किलोमीटर वर असलेल्या एका दुकानात न्यायचा प्रचंड आग्रह केला. आम्ही टॅटू कॅफेत जायचं आहे, इथे ग्रुप फोटो काढायचा आहे वगैरे सांगत होतो, त्यावर अरे वहा क्यू पैसे बरबाद करने है आप को, वहा बस फोटो खिचने के लिये लोग जाते है, उससे बढिया फोटो मै आपको खिचके दूंगा. (त्याने हवा महालाच्या आत फोटो मात्र खरंच चांगले काढले होते) बस दस मिनट आप चलिये. वहिपे आप को यहांसे बढिया खानेकी जगह दिखाऊंगा असा आग्रह लावला. आमच्यातल्या एक दोघांची त्याच्याशी हि हुज्जत चालु असताना इतरांना, मुलांना नीट न समजल्यामुळे ते रिक्षात जाऊन बसलेही होते. प्रचंड ट्राफिक आणि मागच्या गाड्यांचे भोंगे वाजायला लागले होते. शेवटी आम्ही बसलो.

या दुकानाचं वर्णन त्याने दुकान असं न करता इथले कलाकार कारागीर रंगमहालात काम करायचे. त्यांच्यावर राण्यांचे नियंत्रण असायचे. आता इथल्या राणीच्या निगराणीखाली असलेल्या ठिकाणी तुम्हाला नेतो, ब्लॉक प्रिंटिंग दाखवतो असं केलं होतं. पण तिथे समोर गेल्यावर एखाद्या कारखाना किंवा महालाऐवजी साधं दुकान पाहुन सगळ्यांचा, विशेषतः मुलांचा फार हिरमोड झाला. त्यांना प्रचंड भुक लागली होती. तिथे एक गाईडने सांगितलेलं प्रसिद्ध थाळी रेस्टॉरंट खरंच होतं आणि गुगलवर उत्तम रेटिंगही होतं. पण ते सुरु व्हायला आणखी पुष्कळ वेळ होता.

मग आम्ही मुलांना आजूबाजूला कुठेतरी खायला न्यायला पर्याय बघत असताना त्याचा "बस दस मिनट यहां चलिये" असा आग्रह सुरूच होता. मग मात्र आम्ही त्याला झापलं. म्हटलं आम्ही आता मुलांना खाऊ घातल्याशिवाय कुठेही जाणार नाही, तुम्हाला जायचं तर तुमचे पैसे घ्या आणि निघा. मग तो जरा नरमला, आणि मी इथेच थांबतो म्हणाला.

गोविंद देवजी मंदिर

आम्ही मुलांना थोडं खाऊ घातल्यावर ती शांत झाली. जो होता है अच्छे के लिये होता है म्हणतात तसं झालं. या हॉटेलच्या बाजूलाच गोविंद देवजी मंदिर होतं. काल तिथले पट बंद असण्याची वेळ होती म्हणुन दर्शन राहुन गेलं होतं. आता तिथे पुन्हा तशीच वेळ लवकरच होणार होती, म्हणुन आम्ही अक्षरशः पळत पळत मंदिरात गेलो. बाहेरून नेमका अंदाज येत नसला तरी आत प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे.

i39

i40

या मंदिराची कथा अशी कि, औरंगजेबाच्या हल्ल्याच्या भीतीने वृंदावनातील कृष्णाची मूर्ती राजस्थानात आणली गेली. इथल्या राजाने या मूर्तीला आपल्या महालातच एका बाजूला प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले. आणि मूर्तीची आख्यायिका अशी कि हि मूर्ती कृष्णाच्याच वंशातल्या नातवाच्या पिढीतील एकाने घडवली. त्याने आपल्या आईच्या इच्छेसाठी मूर्ती बनवण्याचा तीनदा प्रयत्न केला. पहिल्या दोनदा बनवलेल्या मूर्तीने आईचे समाधान झाले नाही, पण इथे असलेली हि तिसऱ्या प्रयत्नात घडवलेल्या मूर्तीने मात्र आई खुश झाली आणि हमारे गोविंदजी ऐसेही थे अशी त्यावर कौतुकाची मोहोर उमटवली. हि माहिती आम्हाला गाइडनेच दिली. आमचं खाणं आणि दर्शन होईपर्यंत तो दुकानात थांबलेलाच होता. त्याने आम्हाला इकडे आणल्यामुळे आमचा प्लॅन बदलला पण देवदर्शन झालं. गोविंदजींचं बोलावणं असावं.

आम्हाला दुकानात सोडल्यावर तो निघायच्या तयारीत होता. मी त्याला मुद्दाम आठवण दिली, भैया आप तो हवा महल के सामने हमारी फोटो खिचने आने वाले थे... त्याचा चेहरा जरा अडकल्यासारखा झाला. मुलांचं थोडं खाणं आणि न ठरवता दर्शन झाल्यामुळे आम्ही आता जरा शांत झालो होतो, पण मघाशी त्याने जे आम्हाला भरीस पाडून इकडे आणलं होतं त्यामुळे मी त्याला त्याच्याच आश्वासनाची आठवण फक्त करून दिली, आणि मग ठीक है.. निकलीये आप, हम देख लेंगे म्हणुन निरोप दिला.

ब्लॉक प्रिंटिंग

आतमध्ये गेल्यावर दुकानदाराने आम्हाला ब्लॉक प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तुम्ही राजस्थानी प्रकारचे प्रिंटेड कपडे पाहिले असतील. संपूर्ण कापडावर एका विशिष्ट प्रकारचे डिझाईन पुन्हा पुन्हा छापलेले असते. लाकडी साच्यांच्या मदतीने हे केले जाते. आता हे मशीनच्या साहाय्याने सुलभ झाले असले तरी हे असे साचे वापरून आधी हाताने केले जायचे. हि जयपूरची शैली प्रसिद्ध आहे.

i41

i42

एकाच दुकानात राजस्थानी स्त्रिया पुरुष दोघांचे कपडे, बेडशीट, रजया, गालिचे असे सर्व उपलब्ध होते. दोन तीन मजल्यांचे ते दुकान होते. तिथे थोडी खरेदी करून झाल्यावर आम्ही पुन्हा टॅटू कॅफेत जायचे ठरवले.

टॅटू कॅफे

टॅटू कॅफेची खासियत तिथला व्ह्यू असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असते. सगळे पर्यटक तिथे फोटो काढण्यात वेळ घालवतात. त्यामुळे त्यांनी प्रति माणशी २५० रुपये अशी किमान प्रवेश फी ठेवली आहे. तुम्ही ती रक्कम खाण्यापिण्यात वसुल करू शकता. म्हणजे ४ लोक गेले तर किमान १००० रुपये द्यावे लागतीलच, तुम्ही ८०० रुपयांचं बिल केलं तर तुमचा तोटा.. जास्तीचं बिल झालं तर उरलेले पैसे शेवटी भरायचे.

मघाशी जर ते थाळी रेस्टॉरंट चालु असते तर व्यवस्थित जेवणच झाले असते. पण ते बंद असल्यामुळे फक्त चाट पदार्थ खाऊन आमचे पुरेसे जेवण झाले नव्हते. त्यामुळे इतर कुठे आणखी खाण्यापेक्षा आपण कॅफेत गेलो तर तेवढे बिलाचे पैसे वसुल करण्या इतपत तर आपण खाऊच, आणि ह्या बाजूचा व्ह्यु गाईडच्या गडबडीत राहून गेला तोही पाहुन घेऊ असा विचार करून आम्ही तिथेच जायचे ठरवले.

i43

तिथे गेल्यावर टॅटू कॅफेत किमान २ तास वेटिंग असल्याचे कळले. त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर आणखी एक तसाच कॅफे होता. टॅटू कॅफे इतका प्रसिद्ध नव्हता पण तिथे वेटिंग नव्हते, आम्हाला तसाच व्ह्यू आणि बाल्कनीच्या कडेला टेबल मात्र मिळाले. खाद्यपदार्थही आता टॅटू कॅफेची चव न घेतल्यामुळे तुलना करू शकत नाही, पण सर्वांची चव समाधानकारक होती.

i44

संध्याकाळचं वातावरण छान होतं. आमची सगळी ऑर्डर एक एक करत येऊन सगळ्यांचं खाणं पिणं होई पर्यंत आम्हाला निवांत वेळ मिळाला. भरपूर फोटो काढून झाले. व्ह्यू खरंच सुंदर होता. तिथे रस्त्यावर, बाल्कनीज मध्ये, कॅफे मध्ये सगळ्यांची फोटो सेल्फी चालू होते. प्री वेडिंग शूट वाले अनेक कपल आणि त्यांच्या फोटोग्राफर्सची टीम सुद्धा इकडे तिकडे दिसत होते. आम्ही गेलो त्या कॅफेमध्ये सुद्धा दोन कपल्स आणि त्यांची टीम आलेली होती. त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले असा आम्हाला अंदाज आला. त्यांचे थोडे आपापसात आणि स्टाफशी थोडे खटकेही उडाले, पण काही तरी तोडगा निघाला आणि त्यांचे आळीपाळीने फोटो काढणे सुरु झाले.

आमचे खाणे चालु असे पर्यंत स्टाफ एकदम खुशमिसाज होता, तेच आमचं बिल बनल्यावर मात्र त्यांची आम्ही निघण्यासाठी घाई सुरु झाली. त्यांचा धंदाच खाण्यापिण्यापेक्षा त्या जागेमुळे जास्त चालत असल्यामुळे हे अपरिहार्य होते. असो. आमचा आजचा दिवस हवा महालासमोर हवा खात निवांत टेरेस डिनरने संपला.

क्रमशः















































कुमाऊँमधील रम्य भटकंती

भाग १: प्रस्तावना   नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल...