भाग १
शनिवार दि.११ मे २०२४. मे महिन्यातील कडकडीत उन्हाचा त्रास वाचावा म्हणून मी आणि शिंदे पहाटे पाच सव्वा पाचचे दरम्यान सांगली येथील आमच्या घरातून तुंग येथील मारुती मंदिरात जाण्यासाठी निघालो. शक्तीची देवता मारुतीरायाच आपल्याला ताकद देणार त्या जोरावर दोन-सव्वादोन तासात तुंगाला मंदिरात पोहोचलो. जाताना वाटेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य निरामय राहण्यासाठी व्यायाम,वाचन,योगाभ्यास,ध्यानधारणा अशा गोष्टी आवश्यक असल्याच्या चर्चा चालू होत्या.
मारुतीरायांना साष्टांग दंडवत घातला आणि प्रदक्षिणामार्गावर प्रदक्षिणा घालत असताना माझ्या डोक्यात नर्मदा परिक्रमेचा विचार पिंगा घालू लागला. प्रदक्षिणामार्गावर परिक्रमेचा विचार पिंगा घालताच मन त्याची पेरणी शोधू लागले. सन २००८ मधील माननीय प्रतिभाताई आणि सुधीर दादा चितळे यांचे नर्मदा परिक्रमे विषयीचे अनुभव कथन आणि ब्रह्मलीन जगन्नाथजी कुंटे उर्फ स्वामी अवधूतानंद यांच्या टिळक स्मारक मंदिरातील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या सुपीक मातीत हे बीज दडलेले दिसले. परतीच्या प्रवासात शिंदे बरोबर याचा उच्चार झाला आणि त्यानेही लगेच त्याला दुजोरा देऊन होकार भरला.त्याने केवळ होकारच भरला नाही तर लगेच संध्याकाळी जवळच्या मित्रांना फोन करून कल्पना सांगितली व्हाट्सअप ग्रुप तयार केला. मी ही संध्याकाळी घरात हा विचार बोलून दाखविला क्षणात होकार आला आणि बीज अंकुरण्यासाठी जणू मृगवर्षाव झाला.
बीज ते फल हा प्रवास सुफल संपूर्ण होण्यासाठी काय करावे काय टाळावे वगैरे यम,नियम विधी निषेध यांची उजळणी सुरू झाली.समाज माध्यमे, मुद्रित साहित्य यामधील विपुल माहिती धुंडाळण्या व्यतिरीक्त ज्यांनी प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांच्याशी बोलणे,शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटणे अशी आखणी केली.माझे मेव्हणे सुहासराव मराठे यांनी परिक्रमा केली असल्याने त्यांचेशी संपर्क केला.पुण्यातील विवेक चोळकर यांना भेटलो.त्यांनी स्वतः तयार केलेला पायी परिक्रमेचा फ्लेक्स नकाशाच मला दिला.याशिवाय विवेक दंडवते,बिमलखेडकर यांचेशी बोलणे झाले.चोळकर यांच्यामार्फत साने यांचा परिचय झाला त्यांची एक परिक्रमा झाली असून ते दुसरी परिक्रमा करणार असल्याने त्यांचीही भेट घेतली.
ढोबळ रूपरेषा तयार झाली.लगोलग त्याची शक्य तितकी अंमलबजावणी सुरू केली.त्यामध्ये रोज वजन घेऊन किमान १० किमी चालणे,२०० पायऱ्या चढ उतार, सूर्य नमस्कार,योगासने याशिवाय
१) थंड पाण्याने आंघोळ २) स्वतःचे कपडे स्वतः धुणे,३) ताट,वाटी घासणे ४) तोंडावर पांघरूण घेऊन झोपणे.५) लाईट सुरू असताना झोपणे. ६) बिन उशीचे झोपणे ७) गादीवर न झोपणे ८) मोबाईल व टिव्हीचा कमीतकमी वापर ९) वृत्तपत्र न वाचणे याचा सराव सुरू केला. या भौतिक, शारीरिक अभ्यासाबरोबरच,एखाद्या मंदिरात डोळे मिटून शांत बसणे, आजूबाजूचा कोलाहल न ऐकणे, सकारात्मक उर्जा स्थानांना भेटी देणे, संतसाहित्य व अद्वैत ग्रंथ वाचन असा शारीरिक,मानसिक व बौद्धिक तंदुरूस्तीचा अभ्यास सुरू केला.मौनाची आवश्यकता ठळकपणे समोर आली पण कंठ फुटल्यापासुनच्या बडबडीच्या सवयीने मौनाचा सराव म्हणावा तसा झाला नाही.
या बाह्य आणि आंतरिक परिवर्तनाचा सराव सुरू होता.बाह्यपरिवर्तन भौतिकता व बुध्दीशी निगडीत असल्याने त्याचा सराव अवघड वाटत नव्हता परंतु आंतरिक परिवर्तन आध्यात्मिकता व भावनाविश्वाशी निगडीत असल्याने तेथे चाचपडणे सुरू होते.This is neither a trek nor a marathon run but a spiritual walk along the banks of holi river Ma Narmada हे वाक्य मनात घोळत होते.संपूर्ण शरणागत झाल्यानंतर आपल्या देहाकडून परिक्रमा पूर्ण करवून घेतली जाते. निसर्ग,विश्व,ब्रम्हांडाशी तादात्म्य होणे हा spirituality उर्फ अध्यात्माचा एक आयाम आहे.आपल्या पातळी नुसार ही तादात्मता साधता येते.
एके दिवशी नित्योपासनेतील दासबोधातील सच्छिष्य लक्षण समास समोर आला आणि
म्हणोनी साधन अभ्यास आणि सद्गुरु| सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू| सत्कर्म आणि सद्वासना पारू| पाववी भवाचा|
सदुपासना सत्कर्म |सत्क्रिया आणि स्वधर्म | सत्संग आणि नित्यनेम| निरंतर| या ओव्यांनी मार्गदर्शन केले.शुध्द आचार,उच्चार आणि विचार,निष्ठा,दक्षता,उदारता,तत्परता यांसह शक्ति,युक्ती,बुध्दी,धारिष्ट्य,दृढ संकल्प,कायाक्लेश,लीनता अंगी बाणवली पाहिजे याची जाणीव झाली.हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद नर्मदा मैय्या आणि तो सर्वसाक्षी ईश्वर यांचेकडे मागितली. ज्या ज्या वेळी हे शिव धनुष्य मला पेलेल का अशी शंका आली त्यावेळी गीतेतील नवव्या अध्यायातील
अपि चेत्सुदुराचार: भजते मामनन्यभाक्
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:
(असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो
मानवा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय)
या ओळींनी या दुराचाऱ्याच्या मनातील निश्चय ज्योत तेवत ठेवली.
कोणतीही गोष्ट करताना काहीतरी उद्देश असतोच.माझा परिक्रमेचा उद्देश शक्य तेवढे बाह्य व आंतरिक परिवर्तन स्वतःमध्ये घडविणे,नर्मदा मैय्या व त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे आज वरच्या समृध्द जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि भावगीताच्या भाषेत
मागणे न काही सांगण्यासी आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो हे गुज मैय्याला सांगणे त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मला भजनदंग राहू दे अशी प्रार्थना करणे असा होता.
नोव्हेंबर मध्ये परिक्रमा उचलावयाची होती त्यामुळे जुलैमध्ये रेल्वे तिकीट आरक्षण करणे भाग होते. तिकीट आरक्षण करताना बुद्धिच्या आकलना पलीकडच्या काही गोष्टी घडल्या त्या पुढील भागात.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार १५/३/२०२५
फाल्गुन वद्य १ शके १९४६.
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग २
अत्यंत उत्साहाने परिक्रमेची पूर्वतयारी सुरू होती. मागील भागात सांगितल्याप्रमाणे आता रेल्वे रिझर्वेशनची गंमत सांगतो. पुण्यातून खांडवा येथे जाण्यासाठी रोज पुण्यातूनच सुरू होणाऱ्या दोन ट्रेन आहेत ११०७७ आणि १२१४९.
यापैकी ११०७७ झेलम एक्सप्रेस खांडवा येथे अवेळी पोहोचते. त्यामुळे त्याला प्राधान्य न देता १२१४९ पुणे ते दानापूर या गाडीचे आरक्षण करावे असे ठरले. त्यावेळी १२० दिवस अगोदर आरक्षण सुरू होत असे त्यामुळे जुलैमध्ये आरक्षण सुरू होण्याच्या दिवशी आठ वाजता गाडी सर्च केली तर १२१४९ या गाडीचे आरक्षण पुढील सुचनांपर्यंत स्थगित केले आहे असा मेसेज येत होता. 139 या रेल हेल्पलाइनला फोन करून काही उपयोग झाला नाही. शेवटी माझे रेल्वेतून रिटायर झालेले कोल्हापूरचे मित्र शेटे यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. चौकशीअंती असे कळले की काही काळासाठी आरक्षण स्थगित ठेवले आहे लवकरच सुरू होईल. सर्वानुमते तोपर्यंत थांबण्याचे ठरले. काही दिवसानंतर या गाड्यांचे आरक्षण 18 जुलैपासून सुरू होईल असे नोटिफिकेशन आल्याचे समजले.
आरक्षण सुरू झाल्या झाल्या दहा मिनिटातच फुल होऊन वेटिंग लिस्टला कसं जातं हे न सुटलेले कोडं डोक्यात घेऊन १८ जुलै रोजी सकाळी आठ वाजता IRCTC APP उघडले तर नेमकी १२१४९ ही गाडी सोडून इतर गाड्या ओपन झाल्या होत्या. सर्वांना फोन करून सांगितल्यानंतर शेवटी आता अधिक वाट न बघता ११०७७ झेलम एक्सप्रेसचे रिजर्वेशन करावे असे ठरले. त्याप्रमाणे मी पुढे गेलो आणि पेमेंट करण्याचा ओटीपी सुद्धा एंटर केला परंतु पेमेंट फेल झाल्यामुळे रिझर्वेशन झाले नाही बँकेतून माझी रक्कमही वजा झाली नव्हती. पुन्हा पाहतो तर तोपर्यंत १२१४९ या आम्ही ठरविलेल्या गाडीचे रिझर्वेशन ओपन झाल्याचे दिसले लगेच पुन्हा सुरवात केली आणि आश्चर्य असे की आम्हाला पाहिजे त्या गाडीचे तिघांचेही कन्फर्म रिझर्वेशन मिळाले.
ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होणे, बँकेतून माझी रक्कम वजा न होणे आणि नंतर आम्हाला हवी ती गाडी ओपन होऊन त्याचे निश्चित आरक्षण मिळणे या घटनेतून मी असा बोध घेतला की, नर्मदा मैया तुमची परीक्षा पाहते पण त्यात तुम्ही उतरला तर ती तुम्हाला नक्कीच कडेपर्यंत पोहोचविते.
मनी धरावे ते ते होते| विघ्न अवघेचि नासोन जाते|
कृपा केलीया रघुनाथे| प्रचित येते|| या ओवीचा प्रत्यक्षानुभव वेगळा काय असणार.
अन्यथा ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होण्याच्या ७% (ही माहिती गुगलच्या सौजन्याने) एवढ्या कमी शक्यतेत माझे पेमेंट फेल व्हावे बँकेतून पैसेही वजा होऊ नयेत आणि पाहिजे त्या गाडीचे रिझर्वेशन मिळावे हा योगायोग नक्कीच नाही.
या घटनेनंतर माझी श्रध्दा अधिक दृढ झाली, की खरंच नर्मदा मैया माझ्याकडून नक्की परिक्रमा पूर्ण करून घेईल. प्रवासाची अनिश्चितता संपली. परिक्रमे दरम्यान सुटसुटीत पोशाख कसा असावा याची चर्चा सुरू झाली. धोतर-पांढरा अंगरखा,पायजमा-पांढरा शर्ट,लुंगी-शर्ट,धोतर-बंडी असे अनेक पर्याय समोर होते. सुटसुटीत पणाच्या दृष्टीने रामदासी पद्धतीने छाटी प्रकाराचे धोतर नेसून वर बंडी घालावी असे ठरले.सर्वकाळ वजन पाठीवर वागवावयाचे असते त्यामुळे पाठपिशवीचे वजन कमीतकमी ठेवण्यासाठी धोतर-बंडी दोन जोड,पंचा,आंघोळीचे कपडे,स्वेटर,स्लिपींग बॅग,थर्मल वेअर,हातमोजे,पायमोजे,मोठे सुती रूमाल,ताट,पेला,छोटी कात्री,सुई दोरा, आवश्यक औषधे,पूजा साहित्य,नर्मदा मैय्याची तसबीर,कमंडलू,दंड असे कमीतकमी साहित्य अंतिम केले. सर्व मिळून ७-७.५ कि.वजन झाले.शारिरीक गरजांसाठी अत्यावश्यक साहित्याचे ओझे खरंतर कमी आहे पण त्यात चोचले पुरवण्यासाठीचे साहित्य मिळवले तर ते ओझे आपणास वाकवते याचा धडा मिळाला.
दैनंदिन व्यायाम,उपासना,वाचन,मनन सुरू होतेच पण आता सर्व लक्ष प्रवासाचा दिवस कधी उजाडतो याकडे होते. पुढील भागात प्रत्यक्ष मैय्या दर्शन व परिक्रमा उचलली त्याचे कथन पाहू.
प्रकाश फडके
सांगली
गुरूवार दि.२७/३/२०२५
फाल्गुन वद्य १३ शके १९४६
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ३
सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान खांडवा स्टेशनला उतरलो तेथून नर्मदा परिक्रमा उचलण्यासाठी ओंकारेश्वरला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. खांडवा हे आपल्या सर्वांचे लाडके गायक किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगुली यांचे जन्मगाव. बसमधून जाताना त्यांचे स्मारक झर्रकन मागे पडले आणि
आनेवाला पल जानेवाला है,हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है. हे गोलमाल चित्रपटातील गीत नकळत ओठांवर आले वर्तमानकाळात जगावे असा सुंदर संदेश देणारे गुलजार यांचे शब्द.
एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं
वहाँ दास्तां मिली,लमहा कहीं नहीं
थोड़ा सा हँसाके,थोड़ा सा रुलाके
पल ये भी जाने वाला हैं हे शब्द किती सहजतेने, येणारा क्षण जाणार आहे तो परत येणार नाही, त्यामध्ये कधी डोळे दु:खाश्रूंनी ओले होतील तर कधी आनंदाने विस्फारतील असे सांगतात.त्यामुळेच याक्षणी घडणारी कहाणी अशी घडवू की ती प्रेमादरपूर्वक सर्वांना सांगता येईल.नर्मदा परिक्रमेदरम्यान जो काळ व्यतित होणार आहे त्यात वर्तमान भान सतत जागृत राहून त्यामधून अशी कहाणी घडू दे अशी मैय्याला प्रार्थना केली आणि ओंकारेश्वरला उतरलो.
गजानन महाराज आश्रमात खूप गर्दी होती.त्यामुळे आम्ही आमची व्यवस्था दुसरीकडे लावली.
परिक्रमेच्या नियमानुसार नर्मदामैय्याचा प्रवाह एकदा परिक्रमा उचलल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत ओलांडायचा नसतो त्यामुळे मंधाता परिक्रमा लगेचच करण्याचे ठरविले.
नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर गेलो.मध्यम वेगाने वहात असणारा पुण्यसलिलेचा प्रवाह,मांधाता पर्वत असे निसर्गनिर्मित दृश्य समोर होते तर उजव्या हाताला ९५० मी. लांब तर ३३ मी उंच धरण,झुलता पूल असे मानवाच्या निर्मितीचे सुंदर दृश्य होते.झुलता पुल पार करून ओंकारेश्वराचे दर्शन घेतले.मनोभावे नमस्कार केला. आद्य शंकराचार्य रचित निर्वाण षटक गुणगुणताना
नमे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानंद रूप: शिवोहम् शिवोहम्
या ओळींकडे नर्मदा परिक्रमेच्या पूर्वसंध्येला विशेषत्वाने लक्ष जाऊ लागले.या अत्युच्च कोटीच्या स्थितीतील साधू संत
परिक्रमे दरम्यान भेटावेत,या सत्संगामुळे माझ्यात ठासून भरलेले हे सर्व दोष निदान सैल व्हावेत असे वाटू लागले.
त्याच भावावस्थेत मांधाता परिक्रमा सुरू झाली.( अंतर अंदाजे ७ ते ८ कि.मी.) परिक्रमा मार्गावर श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण १८ अध्यायातील ७०० श्लोक कोरून लावले आहेत.मार्गात मैय्याच्या किनाऱ्या लगतचे रामकृष्ण मिशनचे साधना कुटीर लक्ष वेधून घेते.पुढे नर्मदा मैय्या व कावेरी नदी संगम आहे.संगमात स्नानासाठी गर्दी होती.
पुढे आलो, ऋण मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.परिक्रमा मार्गातील १०८ फूट उंचीचा आद्य शंकराचार्यांचा पुतळा आजही शैव,वैष्णव,शाक्त,गाणपत्य,सौर अशा विविध संप्रदायांकडे अद्वैत दृष्टीने पहात असून सर्वांनी एकोप्याने रहावे असा प्रेमळ संदेश देत आहे असेच वाटते.
त्याच परिसरात भगवान शंकरांची ५० फूट उंच मूर्ती आहे.तीन मजली महादेव मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून मैय्या,कावेरी संगम दर्शन होते.वाटेतच मारूती मंदिरात पहुडलेल्या हनुमानाचे दर्शन होते.मार्गात शेवटी भग्नावस्थेतील सिध्दनाथ मंदिर आहे.मंदिरातील शिल्पकला डोळ्यांचे पारणे फेडते पण त्यांची अनैसर्गिक भग्नावस्था विषण्ण करते.
परिक्रमेच्या अंतिम टप्प्यात विसाव्यासाठी थांबलो असता एक वृध्दत्वाकडे झुकलेल्या माताराम आमच्याकडे पाहून म्हणाल्या परिक्रमा उठा रहे हो क्या? मी होकार दिल्यावर त्याही विसावल्या आणि सुनो म्हणत सांगितले की, मैय्याके किनारे महज घुमना परिक्रमा नहीं है,आपस में बाते मत करो,मैय्या का नाम लेते चलो, मंदिर हो तो अंदर जा के प्रणाम करो,जितना हो सके ऑखें बंद करके मूर्ती की मानसपूजा करने की कोशिश करो,रास्तेमें दुसरोंने फेका हुआ कचरा भले मत उठाओ लेकीन हमसे कचरा ना हो इसका ध्यान रखो,खानपान के समय भरपेट मत खाओ,किसिसेभी,कुछ भी होने पर गुस्सा मत करो,मन में सबके प्रति हमेशा प्रेमभाव रखो,सुबह-शाम मैय्याकी आरती भावसे करो,मैय्या हमेशा आपके साथ है इसका पुरा भरोसा करो और आनंदभावसे परिक्रमा उठाओ, तो वो परिक्रमा सफल कराने की जिम्मेदारी मैय्या खुद संभालेगी तुम्हे चिंता की जररूत नहीं. असे म्हणून आम्हाला नर्मदे हर! म्हणून त्या निघून गेल्या.
नर्मदा मैय्यानेच पूर्वसंध्येला येऊन उपदेशात्मक आशिर्वाद दिल्याने मन भावविभोर झाले त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे म्हणत मैय्याला नमस्कार केला आणि उद्यापासून उचलावयाच्या परिक्रमेचे चिंतन करत निद्रावश झालो.पुढील भागापासून प्रत्यक्ष परिक्रमेतील अनुभव पाहू.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार दि. २९/३/२०२५
फाल्गुन कृ.१५ शके १९४६
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
. भाग ४
आज १५ नोव्हेंबर २०२४ कार्तिक पौर्णिमा परिक्रमा उचलण्याची संकल्प पूजा करावयाची होती.वास्तविक अनेकांचे पूर्वानुभव पहाता ही पूजा अनिलदास महाराजांकडूनच करून घ्यावी असे वाटत होते.परंतू एका मित्राने अगोदर पासूनच एका गुरूजींना ठरवून ठेवले होते त्यामुळे त्यांची वाट बघत थांबलो होतो.फोनाफोनी चालू होती.आम्हाला घाटावर उभे राहिलेले पाहून एका मैय्याने विचारले सुध्दा की,अनिलदास महाराजांकडे जाणार आहात का? तो मित्रही म्हणाला जाणार असाल तर तुम्ही दोघे जा.पण भीड आड आली.पहिलेच दिवशी विकल्प नको म्हणून थांबलो.ते ठरविलेले गुरूजी आले पण त्यांनी सांगितलेल्या पूजेने मानसिक समाधान मिळाले नाही.घाटावरील पंडे कसे लूटतात याचा अनुभव आला.असो.कोणत्याही परिस्थितीत मन:शांती ढळू द्यायची नाही असे ठरविले असल्याने शांत रहाता आले.वास्तविक एका मैय्याने विचारणे व त्या मित्राने परवानगी देणे हे अनिलदास महाराजांकडून पूजा करून घेण्यासाठीचे संकेत होते पण भीड नडली.अर्थात त्या गुरूजींचा अनुभव चांगला न आल्यानेच हा तर्क सिध्द झाला.मैय्याला पुढे काय होणार हे ही माहित असते त्यामुळेच ती संकेत देते ते वेळीच ओळखण्याची बुध्दी व्हावी व कोणाचीही भीड बाळगू नये या धड्याने संकल्प पूजेनंतर नर्मदा मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाऊन नर्मदे हरचा गजर करत परिक्रमा मार्गावर पहिले पाऊल उचलले.
नामस्मरण आणि गीता पठण यामुळे चालताना त्रास होत नव्हता.कोठी येथे एक रोटी बाबा आश्रमाचा फलक दिसला त्यांची माहिती अद्भूत आहे.मूळ नाव शिवोहम भारती असणारे एक रोटी बाबा ओरिसाचे रहिवासी असून इंग्रजीचे प्राध्यापक होते.९० च्या दशकात आध्यात्मिक ओढीने त्यांनी हृषिकेश येथे संन्यास दिक्षा घेतली व पदयात्रा करत ओंकारेश्वरला आले.१२ कोटी ॐ नम:शिवाय जपाची साधना त्यांच्या गाठीशी आहे.एक रोटी अभियान चालवून गरजुंना अन्नदान हा त्यांचा संकल्प गेली २५-३० वर्षे अव्याहतपणे सुरू असल्याने ते एक रोटी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची संधी मात्र मिळाली नाही.असो मैय्याची ईच्छा!
१३ किमी चालून मोरटक्का येथील भक्तराज आश्रमात दुपारी १ चे दरम्यान पोहोचलो.भोजनप्रसादी घेतली.हात धुण्याची व भांडी धुण्याची जागा वेगवेगळी होती. परंतु एक परिक्रमावासी त्याचा वापर बरोबर उलटे करत होते.तेथील सेवेकरी मैय्याने कडक शब्दात फलक वाचा असे सांगून त्याची जाणीव करून दिली.एरवी हा प्रसंग अपमानजनक वाटला असता पण परिक्रमा वासी या एका उपाधीने तो अपमान न वाटता
”उघडा डोळे बघा नीट” या उक्तीची आठवण करून देणारा वाटला.
सद्गुरु अनंतानंद साईश यांचे शिष्य प.पू.भक्तराज महाराज यांच्या जीवन चरित्राचा अल्प परिचय झाला.भजन,भ्रमंती,भंडारा हे त्यांच्या भक्तीचे तीन आयाम आहेत. त्यांच्या उपदेशात ते म्हणतात
आपल्या नित्य नैमित्तिक कर्मात रत असताना सुध्दा ईश्वर स्मरण असावे,कारण जर विस्मरण झाले तर धडपडल्या आणि
ठेचकळल्याशिवाय आपण एकही पाऊल टाकू शकणार नाही.
पू.भक्तराज महाराज.
(जिज्ञासूंनी https://bhaktarajmaharaj.org/index.html
ही लिंक पहावी)
सायंकाळी मैय्या किनारी दर्शनाला गेलो.सुर्यास्त समयीचे रक्तवर्ण सूर्यबिंब मैय्याच्या पाण्यात प्रतिबिंबित झाले होते.प्रवाह,तरंग,तुषार हे सुध्दा लोभस लाली ल्याले होते.प्रतिबिंब पाण्याबरोबर हेलकावत होते तर बिंब स्थिर होते.बिंब प्रतिबिंबाचा हा खेळ न्याहाळत मैया किनारी शांत बसून राहिलो.तेथेच मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाईले.सायंकाळच्या रम्य वातावरणात आरती व नर्मदाष्टकमचे शब्द मनाचा ठाव घेत होते.पापनाशिनी मैय्याला नमन करुन भावविभोर अंत:कर्णाने पहिला दिवस संपन्न झाला.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि. २०/०४/२०२५
चैत्र कृ.७ शके १९४७.
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ५
ब्राह्म मुहूर्तावर उठलो.आश्रमात फारशी गर्दी नव्हती.आन्हिकं उरकून मैय्याची आरती व अष्टक गान झाले.गुरू मंदिरात दर्शन घेतले.पवित्र व सकारात्मक उर्जेने ओतप्रोत स्थानी,पहाटेच्या शांत वेळी,गाभाऱ्यात मंदपणे तेवणारी ज्योत साक्षी ठेवून डोळे मिटल्यावर होणारी भावावस्था आनंददायी,वर्णनातीत होती.
रविराजाच्या आगमनाची साक्षीदार पूर्व दिशा हलकेच उजळत होती.पक्ष्यांचे थवे आकाश भरारी घेत होते,वृक्षांचे विविध आकारातील पर्णभार दृगोचर होत होते.उजव्या हाताला मैय्याचा प्रवाह लयबध्द वहात होता.ललना आपल्या घरासमोर सडासंमार्जन करत करत “ नर्मदे हर” चा गजर करत होत्या.हा नैसर्गिक देखावा पहात मार्गक्रमणा चालू होती.मनामध्ये नामगान चालू होते.टोकसर येथे राम मंदिरात दर्शन घेतले.
ख्यालीखुशाली विचारणारे काय विचारतील नेम नाही.एकाने विचारले महाराज परिक्रमा क्यू उठायी? या प्रश्नाने अंतर्मुख झालो आणि तुकोबांचा अभंग मुखी आला.
आजिवरी होतो संसाराचे हाती| आता ऐसे चित्ती उपजले||
तुला शरणागत व्हावे नारायणा| अंगीकारा दिना आपुलिया||
विसरलो काम याजसाठी धंदा| सकळ गोविंदा माझे तुझे||
तुका म्हणे विज्ञापना परिसावी|आवडी हे जीवी जाली तैसी||
कांकरिया येथील सीताराम आश्रमात भोजनप्रसादी झाली.त्या आश्रमातील महंतांचा सत्संग झाला.चर्चेच्या ओघात कोणा कडून तरी नाव,गाव,प्रांत,भाषा या बरोबरच जातपात विचारली गेली त्याला महंतांनी उत्तर दिले की,
साधक,साधू से जातपात मत पुछो,पुछो उसका ग्यान
तलवार से मतलब हो, कौन पुछे म्यान.
रावेरखेडीला पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य,धैर्य,साहस,बुध्दीमत्ता,या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्या मराठा साम्राज्याचा विस्तार अखंड भारत वर्षात करण्यामध्ये सिंहाचे योगदान देणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नर्मदा मैय्याच्या किनारी असणाऱ्या समाधीला वंदन केले.एका अपराजित योध्द्याच्या समाधी स्थळीच्या स्पंदनांची अनुभूती घेतली. ज्यांच्या असीम त्यागामुळे आज आपण नर्मदा परिक्रमा निर्वेधपणे करू शकतो त्या सर्व वीर आणि वीरांगनांना नमन केले.
आमचे परमभाग्य असे की,रावेरखेडीतच दादा गुरु या महान विभूतीचे दर्शन झाले,गेले चार साडेचार वर्षं ते केवळ नर्मदा मैय्याचे जल प्राशन करून रहात आहेत.आपल्या श्रवणीय प्रवचनात त्यांनी झाडांची काळजी घ्या,सेवा देणाऱ्यांप्रती विनम्र रहा,वाणीचे तप करा असा मौलिक संदेश दिला.
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते||
या श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकाची आठवण झाली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी यावर भाष्य करताना
ना तरी एकाधें नाव| तेची शैव का वैष्णव||
वाचे वसे ते वाग्भव|तप जाणावे|| असे सांगून शिव अथवा विष्णू यापैकी एकाचे नामस्मरण हेच वाचिक तप जाणावे असे सांगितले आहे.
कोणाचेही मन दुखावले जाणार नाही असे शब्द माझ्या वैखरीतून यावेत आणि अखंड नामस्मरण होत रहावे अशी विनवणी मैय्या चरणी केली आणि दादा गुरूंना वंदन करुन पुढे निघालो.
पुढे बकावा या गावात आलो.या गावात दुतर्फा शिवलिंग निर्मिती कारखाने आहेत. आपल्या देशातील हे एकमेव असे स्थान आहे की जेथे लहान,मोठ्या,विशाल,
भव्य अशा अनेक आकारात शिवलिंग निर्मिती होते.पुढे मर्दाना या गावात श्री हरी कुटी आश्रमात मुक्काम केला.
विशाल वटवृक्षाच्या छायेत असणारी अनेक मंदिरे,त्यातून होणारे घंटानाद,स्तोत्रपठणाचे स्वर,मैय्याच्या प्रवाहाचा शा़ंत,गहन स्वर,पक्ष्यांचे किलबिलाट,नाविकाच्या वल्ह्याने होणारा चुबुक-चुबुक असा विशिष्ट लयबध्द नाद
अश्या नादब्रह्मात लीन होत.परिक्रमेतील पुढचे पाऊल टाकण्यासाठी आज विश्रांती आधीन झालो.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि. २०/०४/२०२५
चैत्र कृ. ७ शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ६
आश्रमात गर्दी होती त्यामुळे पहाटे चार पासूनच परिक्रमावासीयांची वर्दळ सुरू झाली.मैय्या किनारी जाऊन स्नान केले.माझी प्रात:कालीन नित्योपासना होईपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त परिक्रमावासी मार्गस्थ झाले होते.वास्तविक परिक्रमा नियमाप्रमाणे (अपवाद वगळता)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिक्रमा करावयाची आहे.असो.
मंदिरातील काकड आरती झाली.पूर्व क्षितीज रक्तवर्ण होऊ लागले.पहाटवाऱ्याने लता,वेली आंदोळल्या,पाने सळसळली,मैय्याच्या पाण्यावर लोभस तरंग उमटले,घड्यात पाणी भरताना येणारे आवाज त्यात मिसळले अशा नादमय वातावरणात सूर्यदर्शन घेतले आणि मार्गस्थ झालो.
कापूस,एरंड,पपई,केळीची शेते पार करत भट्यान गावात पोहोचलो.संत सियाराम बाबा या महान विभूतीच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झाले आहे.१०४ वर्षीय बाबा कोणाच्याही आधाराशिवाय चालतात.अनेक वर्षे एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली आहे.ते आजही चष्म्याशिवाय रोज कित्येक तास रामचरित मानस वाचन करतात.कोणत्याही ऋतूत फक्त एक लंगोटी एवढेच त्यांचे वस्त्र आहे.सुखाचा मंत्र सांगताना ते म्हणतात,
सुखी वही होगा जिसने कामना,वासना,लालसाका परित्याग कर दिया.माझे भाग्य असे की,या तपस्वी संतांचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेता आले ( मी भाग्य शब्द याकरिता वापरला की त्यानंतर थोड्याच दिवसात ११ डिसेंबर २०२४ रोजी हे महात्मा ब्रह्मलीन झाले) त्यांच्या आश्रमात ते कोणाकडूनही फक्त रू. १० एवढीच देणगी स्विकारतात.या गावातील आश्रमात भक्तगण,परिक्रमा वासी यांचेसाठी अन्नदान चालते.निर्मोही,जितेंद्रीय,नि:काम अशा विभूतीमत्वांची भेट म्हणजे आपल्यातील दोष खिळखिळे करण्यासाठी घातलेला घाव आहे.हा घाव या दोषांच्या वर्मी बसू दे अशी प्रार्थना केली. या पवित्र क्षेत्री बालभोग (न्याहरी उर्फ नाष्टा या शब्दाला परिक्रमेच्या परिभाषेत बालभोग असा शब्द आहे) घेऊन लेपा या पुढील गावी जाण्यासाठी निघालो.
भारतीताई ठाकूर या कर्मयोगिनीच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध अशा लेपा गावी पोहोचलो. या विभूतीमत्वाची भेट घ्यायचीच हे मी पूर्वीच निश्चित केले होते. परंतु तिथे गेल्यानंतर राम मंदिरात अशी चर्चा चालू होती की, डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील एक मोठा कार्यक्रम त्यांच्या प्रशालेमध्ये होणार आहे आणि त्यासाठी अनेक महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत व्यस्त असल्यामुळे बहुतेक भेट होणार नाही. आम्ही विचार केला की, आपण जे पूर्वीपासून ठरविले आहे त्यात आपणाकडून बदल नको. त्यामुळे श्रीराम मंदिर लेपा येथून चार किलोमीटर दूर लेपा पुनर्वास येथील नर्मदालय या भारतीताई ठाकूर यांच्या कर्तृत्व मंदीरात पोहोचलो. परिक्रमावासी भेटण्यासाठी आले आहेत असा निरोप गेला आणि आश्चर्य म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख, उप पोलीस प्रमुख यांच्याबरोबर चालू असलेली बैठक थांबवून त्यांनी आम्हाला भेट दिली. परिक्रमा वासी ही एक उपाधी धारण केल्यानंतर नर्मदा मैया च्या कृपेने आपले महत्त्व कसे वाढते याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला.त्यांच्या पायावर माथा टेकवून आशिर्वाद घेतला. परिक्रमेदरम्यान पाळावयाची पथ्ये परिक्रमेचे नियम याबाबत काही कानमंत्र त्यांनी दिले. आता भारतीताई यांनी संन्यास दीक्षा घेतली आहे.२००५ मध्ये उघड्या डोळ्यांनी केलेल्या परिक्रमेने त्यांचे मातृहृदय कळवळले आणि २००९ पासून त्यांनी नेमाड प्रांतातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.त्यांची आपल्या कार्याविषयीची तळमळ पाहून स्थानिक समविचारी जवळ आले आणि Nimar Abhyudaya Rural Management and Development Association (NARMADA). या अपत्याचा जन्म झाला. एका हाताच्या बोटावर मोजता येणारी विद्यार्थी संख्या आता चार आकडी झाली आहे.निवासी शाळा,गोशाळा,फिरती विज्ञान प्रयोगशाळा अशा उपक्रमातून रत्नपारख्याकडून हिऱ्यांना पैलू पाडले जात आहेत.
स्वाध्याय परिवारात
नारायण मंत्र जपत हिंड तू जगात
कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात
असे भावगीत आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीताई.
(जिज्ञासूंसाठी वेबसाईट लिंक)
(https://www.narmadalaya.org/main/History)
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे यांनी एकदा जाहीरपणे खंत व्यक्त केली होती की, नम्रपणे माथा टेकावा असे पायच आता दुर्मिळ झाले आहेत. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरील अशी कर्तव्यनिष्ठांची मांदियाळी पाहून ही खंत दूर होते.आपला जीवनोद्देश शोधण्यास,शोधला असल्यास त्यावर अविचल रहाण्यास मदत करणारे असे पुण्यात्मे भेटणे ही परिक्रमेची पर्वणी मनात साठवून आजचा दिवस माझे रितेपण भरता झाला.
प्रकाश फडके
सांगली
सोमवार दि.२१/४/२०२५
चैत्र कृ. ८ शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ७
काल भारतीताईंशी झालेल्या संवादामुळे उत्साह आणि आनंद गुणित झाला होता.मैय्या किनाऱ्याने परिक्रमा सुरू होती.मैय्याचे विशाल पात्र,खळाळता प्रवाह,उडणारे तुषार,उठणारे तरंग हे पाहून नर्मदाष्टक मधील
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे||
हे प्रथम चरण सहजपणे गुणगुणले जाते. तुझ्या सहवासात माझ्यातील द्वेष,मत्सराचे रूपांतर प्रेम व सद्भावनेत होवो मला वाटणाऱ्या मृत्युदूताच्या भीतीचा तुझ्या रक्षणात्मक कवचाने नाश होवो.अशी प्रार्थना करता करता नावडाटोला गावात पोहोचलो.हे गाव माहेश्वरच्या बरोबर विरुद्ध किनाऱ्यावर आहे त्यामुळे येथून माहेश्वरचा अहिल्यादेवी होळकरांचा किल्ला व रेखीव घाट सुस्पष्ट दिसतात.शककर्त्या शालिवाहन राजाने स्थापन केलेल्या भव्य शिवमंदिरात दर्शन घेतले.सभोवती द्वादश ज्योतिर्लिंगांची स्थापना केली असल्याने त्यांचेही दर्शन होते.पुढे निघालो.
आजची परिक्रमेची चाल बहुतेक मैय्या किनाऱ्याने असल्यामुळे खूपच आनंददायी प्रवास होत होता.प्रवासमध्यात थकवा पळावा आणि तरतरी यावी उद्देशाने मैय्यांच्या शीतल जलाने मार्जन केले.त्या शीतल संपर्काने थंडावलो आणि मनात विचार आला की,माझ्या संपर्काने कितीजण थंडावत,सुखावत असतील? उत्तर शोधू जाता या मार्गावर आपण खूप पिछाडीवर असल्याचे लक्षात आले.
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ||
हा श्लोक व दोन दिवसांपूर्वी दादा गुरुंनी सांगितलेले वाणीचे तप आठवले.माझी वाणी प्रेमळ होवो,माझा संपर्क सर्वांप्रती शीतल होवो असे विचार तरंग मनात येत होते.
प्रवाहाकडे शांतपणे पहाताना माझे जीवन सुध्दा असेच प्रवाही असावे,साचलेपणातून येणारी निष्क्रियता त्यात नसावी,कोणताही अडथळा आला तरी प्रयत्नपूर्वक तो दूर करून पुढे जावे असा संदेश मैय्याचा तो संथ प्रवाह देत होता.
दर मजल करता करता ढालखेडी आश्रमात पोहोचलो.ग्रामस्थ एकजुटीने परिक्रमावासियांच्या सेवेत व्यग्र होते.डाळ खिचडी,मठ्ठा अशी सुग्रास भोजनप्रसादी घेऊन पुढे निघालो.वाटेत चिंचली या गावात मैय्या किनारी विशाल वटवृक्ष होता.वृक्षाच्या शीतल छायेत,डोळे मिटून शांत बसून राहिलो.मैय्याचा किनाऱ्यावर माझ्यासारख्या बध्दालासुध्दा अंतर्मुख करवणारी अशी नैसर्गिक रचना आहे. त्यामुळे या किनाऱ्याच्या उभय तटांवर अनेक सिध्दांची तपोभूमी आहे यात नवल ते काय?
पुढचा पांदीचा रस्ता एकावेळी जेमतेम एकच व्यक्ती जाऊ शकेल इतका अरुंद होता.त्याच रस्त्यावर माझ्यापुढे यमराजांचे वाहन असणारा एक रेडा झोकात चालला होता.माझ्या चाहुलीने तो सतत मागे वळून पहात होता,त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती.माझा वेग मी वाढवला तर तोही धावत होता,जमिनीवर दंड आपटून आवाज केला तर जोरात पळत होता
मी मंदावलो तर तोही संथावत होता,हा पाठशिवणीचा खेळ बराच वेळ चालू होता, पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता.काय करावे अशा विचारात असतानाच एक दुचाकीस्वार मागून आला आणि उजव्या बाजूच्या चढावर असणाऱ्या शेताच्या बांधावरून गेला.मला मैय्याने रस्ता दाखविला, मी ही त्या बांधावरून पुढे गेलो आणि हा पाठशिवणीचा खेळ थांबला.
ब्राम्हण गाव येथे पोहोचलो.आखीव,रेखीव,
घडवलेल्या काळ्या पाषाणाच्या सुंदर घाटावर मैय्याच्या जलातील शीतलतेने थंडावलेला वारा झुळझुळ वहात होता, सूर्यबिंब पश्चिम क्षितिजाला टेकले होते.मंदिरातील आणि पाणी प्यायला आलेल्या गोधनाच्या गळ्यातील घंटानादाने वातावरणात पावित्र्य भरत होते.अशा वातावरणात सायंकालीन उपासना केली आणि घाटानजीक असणाऱ्या आश्रमात आसन लावले (विश्रांतीसाठी आपण आपली बैठक पसरतो त्याला परिक्रमेच्या परिभाषेत आसन लावणे असे संबोधतात.)
प्रकाश फडके
सांगली
बुधवार दि.३०/४/२५
वैशाख शु.३ अक्षय्य तृतीया
शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ८
झुंजुमूंजू झाले.आन्हिके व प्रात:उपासना झाली.महाराज चायप्रसादी ले लो कानी पडले.परिक्रमेची परिभाषा किती भावपूर्ण आहे ते चाय या वास्तविक विदेशी पेयापुढे प्रसादी हा शब्द जोडल्याने लक्षात येते.देवाला नैवेद्य दाखविला की त्यामध्ये दैवी कृपाशिर्वाद उतरतात मग ते अन्न,पेय साधारण न रहाता विशेष बनते.त्याच्या सेवनाने शरीर,मन,बुध्दी,चित्त यांची शुध्दी होते.”प्रसादस्तु प्रसन्नता” या उक्तीप्रमाणे आपण प्रसन्नचित्त होतो.
चायप्रसादी घेऊन प्रसन्नचित्ताने आजचा प्रवास सुरू झाला.कपिलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले.एक मराठी परिक्रमावासी शिवस्तुती गात होते.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी| कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी|
पासून
शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊ नको।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको||
काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टासी शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको||
पर्यंत शिवस्तुती गायन झाले.गाभाऱ्यातील ध्वनींनी उत्कृष्ट वातावरण निर्मिती झाली.भक्तिभावाने केवळ नामस्मरण केल्यास जीवन नौका पार होते ही सनातन श्रध्दा दृढ झाली.
दुतर्फा केळीच्या बागातून आजची वाटचाल सुरू होती.
केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या
मामा आमचा प्रेमाचा घडावर घड धाडायचा
ही इंदिरा संत यांची बालकविता आठवली. आणि अहो आश्चर्यम्! घडले. एका शेतात केळीचे घड उतरविण्याचे काम सुरू होते. नर्मदे हर! चा पुकारा करून शेतकऱ्याने बोलाविले आणि समोर अख्खा पिकलेला घड ठेवला.केवळ कवितेतील आजोळ आठवताच शेतकरी मामांनी केळी खायला देणे हा मैय्याचा कृपाप्रसादच होय.
परिक्रमा पथावर भेटणारा प्रत्येक पांथस्थ (नुकतेच बोबडे बोल बोलू लागलेल्या कन्हैया-राधा पासून ते पैलतीराकडे नेत्र लागलेल्या आजी- आजोबांपर्यंत) अत्यंत श्रध्देने नर्मदे हर! हा मंत्र जपत असतो.प्रत्येकाच्या अहंकाराचे हरण करून आनंद देणारी असा या मंत्राचा सर्वमान्य अर्थ आहे.नर्मदे हर! चा जयघोष करून प्रसाद भक्षण करून मार्गस्थ झालो.
आज मैय्याने बालभोगाचा (आपल्या भाषेत नाष्टा/न्याहरी) वर्षाव चालविला होता.कारण प्रत्येक गावात महाराज बालभोग ले लो म्हणून आग्रह होत होता.परिक्रमा संकेतानुसार विनंतीचा अव्हेर करायचा नसतो.त्यामुळे विनंतीला मान देऊन नर्मदे हर! म्हणून घटकाभर बसणे गरज असल्यास प्रसादी घेणे नसल्यास नम्रतेने नर्मदे हर! म्हणून निरोप घेणे.असा सिलसिला सुरू होता.
भोजनप्रसादीच्या वेळेपर्यंत बडवानी या शहरात पोहोचलो.श्री सिध्देश्वर सेवा संस्थान संचलित सुसज्ज आश्रम आहे.आजचा प्रसाद जिलेबी,वडा,मिरची भजी,रोटी,भाजी,डाळ,भात असा चौरस होता.मनात विचार येऊ लागला की, मैय्या आज खाण्यापिण्याची एवढी चंगळ का करत आहे? मैय्याच याचे उत्तर योग्यवेळी देईल या समजुतीने विचार दूर केला.नर्मदे हर! म्हणून भोजन पूर्ण केले.
विश्रांती नंतर आश्रमातील सेवेकरी महंतांचा निरोप घेण्यास गेलो तर ते दोन पत्रकं हातावर ठेवून माहिती सांगू लागले,महाराज! अब कलसे आपको दक्षिणतट की शूलपाणी झाडीसे गुजरना है.यदी आपको झाडीके कठीण रास्तेसे गुजरने में दिक्कत हो तो आप बडा रास्ता जो बावनगजासे शुरू होता है उस रास्तेसे जा सकते हो,और यादी आप शूलपाणी झाडीसे जाना चाहते हो तो जंगल का रास्ता जो बोरखेडीसे सुरू होता है, ले सकतो हो, इन दो परिपत्रमें उसकी सब जानकारी दी गई है.दोनो रास्ते बाद में गोरा कालोनी में मिल जाते है.
सकाळपासून मैय्या जे खाण्यापिण्याचे लाड करत होती,त्याचे कारण कळले. उद्यापासून आठ ते दहा मुक्काम शूलपाणी झाडीत करावे लागणार होते.लेकराची आबाळ होईल ही काळजी तिला होती.
लेकराचे हित|वाहे माऊलीचे चित्त||
ऐसी कळवळ्याची जाती|करी लाभेविण प्रीती||
पोटी भार वाहे| त्याचे सर्वस्व ही साहे||
तुका म्हणे माझे| तैसे तुम्हा संतां ओझे||
हा तुकोबांचा अभंग आठवत साश्रुनयनांनी पुढे निघालो.
वयाने ज्येष्ठ होईपर्यंत संसाराचा भार वाहून वाकलेला गृहस्थी उशिरा का होईना काही तप करून इच्छित असेल तर परमेश्वर त्याला सहाय्यभूत होणारच याची प्रचिती आली.
नाम गात,गीता पाठ करत सुर्यास्त समयी गायत्री परिवार ट्रस्ट संचलित पिछोडी या गावातील आश्रमात पोहोचलो.
उंच डोंगराच्या टोकावर अस्ताला जाणारे सूर्यबिंब विसावले होते.घरट्याच्या ओढीने पक्षांचे थवे वेगाने जात होते,अंधाराची शाल भूमातेवर पांघरून उद्या उगविण्यासाठी सूर्य अस्ताला चालला होता.मावळत्या दिनकराला नमन करून आश्रमात विसावलो.सायंप्रार्थना,उपासना झाली.
आश्रमात तयार भोजनप्रसादीची सोय नसल्याने आज प्रथमच सदाव्रत घ्यावे लागणार होते.(शिधा घेऊन आपले अन्न आपण शिजवणे याला परिक्रमेच्या परिभाषेत सदाव्रत असे म्हणतात) योग्य तो शिधा घेऊन परिक्रमा वासी एका मातारामच्या (स्री परिक्रमा वासियांना माताराम असे संबोधतात) मदतीने डाळ खिचडी बनवली.आज मैय्याने जसे लाड केले तसेच स्वतःचे काम स्वतः करावे असाही धडा दिला.आजपर्यंत चहाचे आधणही न ठेवणाऱ्याला मैय्याने खिचडी बनवायला लावली.तिच्या कृपेने प्रसादीही चांगली झाली.नर्मदे हरच्या गजरात भोजन झाले.शुलपाणीच्या जंगलात पहिल्या मुक्कामी निद्रावश झालो.
प्रकाश फडके
सांगली
बुधवार दि.३०/४/२५
वैशाख शु.३ अक्षय्य तृतीया शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग ९
का,कधी,कुठे,कसं,किती,असंच का,इथेच का,आत्ताच का,इतकंच का,माझ्याच बाबतीत का असे अनेक प्रश्न माणसाच्या डोक्याची चाळण करत असतात.काहींची उत्तरे मिळतात तर काही प्रश्न अनुत्तरीत रहातात.सुटलेल्या प्रश्नांची उत्तरेसुध्दा अनेकदा आकलनापलीकडची असतात.काही प्रश्न तर अनुत्तरीत रहातात.
शूलपाणीच्या जंगलाप्रवासात काही पूर्वसूरींना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी केलेले लिखाण असेच माझ्या आकलनशक्तीच्या पल्याड असल्याने मी त्याला गूढतेच्या चौकटीत बसविले होते.एकदा का एखादी घटना गूढतेच्या चौकटीत बसविली की चिकित्सेला फाटा देऊन चमत्कार रूपी गंध फुलांनी त्याची पूजा करून आपली सुटका करून घेता येते.पण परिक्रमेची साधना सुरू केल्यापासून बुध्दीगम्यते प्रमाणेच भावगम्यताही असते अशा आकलनापर्यंत मी आलो होतो.त्यामुळे बुध्दी ज्याचे उत्तर देऊ शकत नाही त्याठिकाणी भावभावना समजून घेतल्यास उत्तरेही मिळतात आणि प्रश्न पडणे ही कमी होते.असे माझे आकलन झाले होते.
या बाबतीत ऐतिहासिक उदाहरणात सापाचा चाबूक हातात घेऊन वाघासमवेत चांगदेवांचे ज्ञानेश्वर माऊलींनी भेटण्यासाठी येणे,त्यांच्या स्वागतास माऊलींनी भिंत चालवत घेऊन जाणे आपण ऐकून आहोत.चाळीसगावच्या डॉ.पूर्णपात्रेंचं सोनाली सिंहीणी बरोबरच नातं,प्रकाश आमटेंचे स्नेही असणारे नेगल आणि अन्य वन्यप्राणी ही तर आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणे.त्यामुळे मला जी गोष्ट अशक्यप्राय वाटते ती तशीच असेल असे नाही हे नक्की.
माझा प्रवास शूलपाणी झाडीतून सुरू आहे माझ्यासारख्या सामान्याला वाटणारे अशा घटनांचे अप्रूप आणि अणिमा,लघिमा,महिमा,गरिमा,प्राप्ती,प्राकाम्य,ईशित्व,वशित्व अशा अष्टमहासिध्दींचे आकर्षण यातून वरील विचारमंथन माझ्या डोक्यात सुरू होते.त्याचबरोबर शूलपाणीच्या जंगलातील भिल्ल आणि आदिवासी परिक्रमावासियांना लुटतात त्यांच्या अंगावर नुसत्या लंगोटी शिवाय काहीही ठेवत नाहीत.असाही अनुभव येतो.
बध्द ते सिध्द या चार पायऱ्यांपैकी बध्द नामक पायरीवर असणाऱ्या मला ही शूलपाणीची झाडी,त्यातील निसर्ग, वन्यप्राणी आणि मानव काय अनुभव देतात या उत्सुकतेने वाटचाल सुरू होती.
पिछोडीहून सुरू झालेली वाटचाल मोरकट्टा येथे आली आणि एका आश्रमात भोजनप्रसादीसाठी थांबलो.
तेथील महंत बहुभाषिक होते त्यामुळे मराठीत वार्तालाप सुरू झाला.तरूण वयात संन्यास घेऊन परिक्रमावासियांच्या सेवेसाठी ते येथे राहिले आहेत.भाजी धूणे,चिरणे अशी अर्धकौशल्याची कामे करून त्यांना मदत केली.तो पर्यंत वीस-पंचवीस मूर्ती(परिक्रमा वासियांना मूर्ती हे संबोधन आहे) आल्या होत्या.पहिल्या पंगतीला वाढण्याचे काम केले.रामरस (मीठ),लंका(मिरची) असे परिक्रमेच्या परिभाषेतले दोन नवीन शब्द समजले.
तेवढ्यात एक आक्रीत घडले.गावातील एक स्त्री व पुरूष असे दोघेजण येऊन हा आश्रम आम्हीच चालवितो वगैरे सांगू लागले. इतक्यात ते भगवी कफनीधारी महंत पण आले.फुकटचे श्रेय घेऊ नका रात्रंदिवस मी इथे राहतोय कोणीही साधी विचारपूसदेखील करत नाही वगैरे प्रतिवाद करू लागले.शब्दाने शब्द वाढत चालला सर्वच मूर्ती स्तब्ध झाल्या.न रहावून एक बुजुर्ग मूर्ती उठली.कोणीच श्रेय घेऊ नका हे सर्व मैय्याच्या कृपेने होते आहे हे विसरू नका. आपसातील वाद आपसात मिटवा. परिक्रमावासी येथे मोफत राहायला खायला मिळते म्हणून येत नसतात तर काही आध्यात्मिक अनुभूती घ्यावी या उद्देशाने येत असतात त्यात तुम्ही विरजण टाकू नका. तुम्ही जी वेळ निवडली आहे ती एकदम चुकीची आहे आपसात बसून वाद मिटवा नर्मदे हर! या त्यांच्या कथनानंतर सर्वत्र शांतता पसरली आणि नर्मदे हरच्या गजरात भोजन प्रसादी सुरू झाली.
थोडक्यात मतभेद हा माणसाचा स्थायीभाव आहे.स्थळ,काळ,वेळ पवित्र असली तरी कफनीधारीसुध्दा क्रोधाविष्ट होऊ शकतात.
म्हणोनी आइके अर्जुना|जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना|
मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना|पुरो शके||
या ओवीत माऊलींनी इंधनाला लागलेली एक साधी ठिणगी ते भडकून त्रिभुवन सुध्दा जाळू शकते तद्वत अंत:करणात थोडेजरी जरी विषयांचे स्मरण झाले तरी मोठा अनर्थ ओढवतो असे सांगितले आहे ते पुन्हा या घटनेने अधोरेखित झाले.
दुपारच्या सत्रात बोरखेडी येथे पोहोचलो.नर्मदा सरोवर प्रकल्पामुळे साठवलेल्या पाण्याच्या फुगवटा किनारी हिरालाल रावत उर्फ हिरा मामा यांच्या कुटीत आसन लावले.गेली अनेक दशके ते परिक्रमावासियांची निस्वार्थ भावाने सेवा करीत आहेत.
किराणा दुकान,छोटी गिरणी असा त्यांचा व्यवसाय आहे.
ते स्वतः अनेक वर्ष बोरखेडी पंचायतीचे सरपंच राहिले आहेत. नर्मदा सरोवर प्रकल्पामुळे अनेक जण विस्थापित झाले आहेत असेही त्यांनी सांगितले. स्वतः त्यांची मुले इतरत्र नोकरीस असतात. ते आणि त्यांच्या पत्नी येथे राहुन परिक्रमावासीयांची सेवा करतात. बोरखेडी पर्यंत आता पक्का डांबरी रस्ता झालेला असल्यामुळे हा भाग पूर्वी इतका दुर्गम राहिलेला नाही.
त्यांच्याशी संवाद करताना साहजिकच शूलपाणीच्या जंगलातील लुटमारीचा विषय निघाला. त्यावर त्यांनी सांगितले की ते स्वतः,घोंघसा येथील ब्रह्मलीन लखनगिरी महाराज आणि
इतर समविचारी सेवाव्रतींच्या प्रयत्नातून आता लुटमार पूर्णपणे थांबली आहे. भिल्ल,आदिवासी यांचे राहणीमान हळूहळू सुधारत आहे. आता ते परिक्रमाासियांना लुटत नाहीत त्याऐवजी वयस्कर परिक्रमावासी ज्यांना स्वतःची पाठपिशवी उचलून चालणे शक्य नाही त्यांना ते योग्य मोबदला घेऊन मदत करतात.
अर्थात वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण ज्या संस्कृतीत आहे त्या संस्कृतीत असे परिवर्तन होणे अशक्य नाही.
हिरालाल यांच्या कथनामुळे लुटमारीचा विषय डोक्यातून पूर्णपणे नाहीसा झाला.उद्यापासून शूलपाणीचे प्रत्यक्ष जंगल प्रारंभ होणार आहे.चढ उतार,खाच खळगे,दऱ्याखोरी,पायवाट, ओढे नाले,दगड गोटे,दलदल,चिखल,जंगल,वन्यजीवांचे दर्शन होण्याची शक्यता,विस्मयकारक भौगोलिक रचनांमुळे घडणाऱ्या चमत्कारिक घटना,सावल्यांचे खेळ अशा अनेकविध आव्हानांना उद्यापासून सामोरे जाण्यासाठी आज निद्राधीन झालो.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार दि.३/५/२५
वैशाख शु.६ शके १९४७
भाग १०
पहाटे उठलो.स्नान झाले.हिरामामांकडे चायप्रसादी झाली नर्मदे हरच्या गजरात शूलपाणीच्या जंगलमार्गावरील पुढील प्रवास सुरू झाला.उजव्या हाताला नर्मदा मैय्याचा विशाल जलसाठा,डावीकडे उंचच उंच डोंगररांगा अशा नैसर्गिक नजाऱ्यात आगेकूच सुरू झाली.डोंगर माथ्या आडून सूर्यबिंब वर आले.पायवाटा प्रकाशल्या.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
हे सुधीर मोघेंचे प्रकाश सूक्त ओठावर आले.
दमछाक करणारी चढण सुरू झाली.जंगलातील वृक्षाच्छादनामुळे झाडांच्या सावलीतून प्रवास होत होता.मधूनच येणारी हलकिशी वाऱ्याची झुळूक सुखावत होती.झाडांच्या बुध्यांना बांधलेल्या रिबीनी दिशादर्शन करत होत्या.एका मोठ्या दगडावर विसावलो.
निसर्गाच्या विस्तृत पटलावर नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी पसरले होते. समोरच्या जलाशायातील निष्पर्ण वृक्ष्याच्या बुंध्यावर बगळे विश्रांती घेत होते.काठावरील बगळे वृक्षासनाच्या स्थितीत लबाडीने डोळे मिटून सावजाची वाट पहात होते.बकध्यान हा शब्द का रूढ झाला त्याचे प्रत्यंतर समोर होते.मधेच एखादी प्रवासी बोट ऐलतीरावरून पैलतीरावर जात होती.आकाशात पक्षी स्वच्छंद विहरत होते. जलाशयात वृक्षांच्या सावल्या दिसत होत्या.वाऱ्याने पाण्यावर उठणारे तरंग विस्तारत काठावर येऊन आदळत होते.हे भान हरपून टाकणारे दृश्य निसर्गाशी तादात्म्य होण्यास मदतगार होते.अशा ठिकाणी डोळे मिटून शांत बसण्याचा अनोखा अनुभव घेतला.
कुली हे गाव आले.३ किमीच्या प्रवासाला दोन तास लागले यावरून चढाचा अंदाज यावा.अशा दुर्गम ठिकाणी आश्रमाचे बांधकाम सुरू होते.ज्या ठिकाणी गरज आहे त्याठिकाणी आश्रमाची सोय करण्याची सेवाभावीवृत्ती दाद देण्यासारखीच आहे.ज्याठिकाणी लूटमार होत होती त्याठिकाणी सेवाभावी वृत्तीचे रोपटे बहरू लागले होते.हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.
घोंघसा येथील लखनगिरी महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी आता १५ मि.बोटीचा प्रवास करावा लागतो.(सरदार सरोवर धरणामुळे बऱ्याच ठिकाणचा जुना नर्मदा परिक्रमापथ बुडीत क्षेत्रात गेल्याने मार्ग बदलले आहेत.) आश्रमात भोजनप्रसादी झाली.नंतर आश्रम परिसरातील टेकडीवर असणाऱ्या पंचमुखी मारुती मंदिरात गेलो. रामरायांचे भजन करत मारुती मंदिरात बराच वेळ गेला.टेकडीच्या उत्तर मध्य टोकावर उभे राहून आश्रमाकडे पाहिल्यास शंकराच्या पिंडी सारखा आकार दिसतो.आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमुळे मन:शांतीची अनुभूती होत होती.
एवढ्यात खालून माझे मित्र शिंदे,साने हाका मारू लागले.खाली पोहोचलो तर ते सांगू लागले की आश्रमात राहू देत नाहीत कारण दोन पर्यंत येणारे परिक्रमावासी भोजन करून पुढे जाणे अपेक्षित आहे अन्यथा मागून येणाऱ्या परिक्रमावासियांची सोय होणार नाही त्यामुळे ते पुढे जावा येथे राहू नका असे मागे लागले आहेत.वास्तविक पूर्वनियोजनानुसार लखनगिरी महाराजांच्या आश्रमात एक दिवस राहून येथील सकारात्मक उर्जेने आपण ही उर्जावान व्हावे असा बेत फार पूर्वीपासून ठरविला होता.काय करावे? मैय्याला शरण जावे.ती मार्ग दाखविते.असा विश्वास होताच.
सेवाव्रतींना सांगितले की,आम्ही येथे एक दिवस मुक्काम करू इच्छितो आपण आश्रमाच्या महंतांना भेटू दिल्यास त्यांना विचारून निर्णय घेता येईल. त्यांनी होकार दिला आणि आम्ही महंतांच्या भेटीस गेलो. त्यांना विनंती केली की परिक्रमा जेव्हापासून मनात आली तेव्हापासून घोंघसा येथे लखनगिरी महाराजांच्या आश्रमात एक दिवस राहावे ही इच्छा आहे. आपण विचार करावा आम्ही कोठेही आसन लावण्यास तयार
आहोत. दोन-तीन प्रश्न विचारून त्यांनी आमच्या इच्छेची खात्री करून घेतली. राहण्यास परवानगी दिली. मैय्यावर सर्व सोपवून त्याप्रमाणे वागल्यास ती मार्ग दाखवते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सायंकाळी महंतांनी आम्हाला बोलावून घेतले. ग्रृहस्थाश्रमातील बऱ्यापैकी सर्व जबाबदाऱ्या आता पार पाडल्या आहेत. पूर्वीच्या काळी या वयात वानप्रस्थाश्रम स्वीकारत होते. आता तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हळूहळू कमी करत जा. तुम्हाला रुचेल ती समाजसेवा करा आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त लक्ष द्या. संसारात राहून अलिप्त राहण्याचा अभ्यास करा. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका. जास्तीत जास्त वेळ सत्संगात घालवा. संतुलित जीवनशैलीचा अंगीकार करा.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥ हे सतत स्मरणात ठेवा. परिमित आहार, संतुलित कर्मचेष्टा,तोलून मापून बोलणे,योग्य व्यायाम,वेळेवर व पुरेशी झोप यामुळे शरिरातील सप्तधातू संतुलीत रहातील.
ऐसे युक्तीचेनी हाते|जै इंद्रिया वोपिजे भाते||
तै संतोषासि वाढते|मनचि करी||
म्हणजेच परिमित इंद्रिय तृप्ती झाल्यास मन संतोष वृध्दी करते.
यापुढील पायरी म्हणजे
बाहेर युक्तीची मुद्रा पडे| तव आत आत सुख वाढे||
तेथे सहजेचि योगु घडे| नाभ्यासिता
. बाह्य इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करता सहजच योग घडतो.
असा सत्संग सुरू होता. तुम्ही केव्हाही आश्रमात येऊ शकता येथे तुम्ही चातुर्मास करण्यासाठी या असे त्यांनी आमंत्रण दिले.त्यांची उपासनेची वेळ झाल्याने आम्ही त्यांचा निरोप घेतला.
ज्या ठिकाणी राहू देण्यास मनाई करत होते त्याच ठिकाणी सत्संगाचा उपहार मिळाला ही मैय्याची कृपाच नव्हे काय?मनोमन मैय्याला नमस्कार केला आणि शूलपाणी जंगलातील मुक्काम सार्थकी लागल्याच्या तृप्तीने झोपी गेलो.
प्रकाश फडके
सांगली
शनिवार दि.३/५/२५
वैशाख शु.६ शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा
भाग ११
घोंघसा आश्रमाचा निरोप घेतला.आजही पूर्ण चढाचा रस्ता आहे.चालताना अतिशय काळजीपूर्वक चालावे लागत होते.पाय घसरला तर कपाळमोक्ष निश्चित.नोव्हेंबर महिना असल्याने ओढ्यानाल्यांचे प्रवाह अजुनही दमदार होते.आश्चर्य म्हणजे ज्याला रस्ता म्हणणे अशक्यप्राय आहे त्या पायवाटेवरून,दगडा चिखलातून भिल आदिवासी तरूण निडरपणे मोटरसायकल चालवत होते.
सूर्य नुकताच वर आला होता.एका वळणावर एक माताराम तीन दगडांची चूल मांडून चायप्रसादी तयार करत होती.हा सेवाभाव पाहून उर भरून आला.आपल्याकडे जे नाही ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक जसे समाजात आहेत तसे आपल्याकडे जे आहे त्या चतकोर,नितकोरात दुसऱ्याला सामील करून घेणारे असे सेवाभावी सुध्दा आहेत.फक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मेट्रो,टियर १,२,३ सिटीज् अशा धंदेवाईक वर्गीकरणातून बाहेर पडून.शरद जोशींच्या व्याख्येतील भारतात भ्रमण करावे लागेल.चायप्रसादी घेतली,हळूच त्या मैय्या सोबत असणाऱ्या कुमारिकेच्या हातात कृतज्ञता म्हणून काही द्रव्य दिले.मार्गस्थ झालो.
पुढे एका वळणावर दोन रस्ते फुटत होते.एक डोंगरमाथ्यावर जात होता तर दुसरा दगडगोट्यांनी भरलेल्या ओढा पात्रातून जात होता.संभ्रमातच डोंगरमाथ्याकडील रस्ता पकडला ५-१० मि.चालून वर आलो तर पलिकडच्या डोंगरावर मेंढ्यांच्या कळप दिसला.नर्मदे हर! या मंत्राचा घोष केला.पलिकडून एका मेंढपाळाने प्रतिसाद दिला.तो म्हणाला,महाराज! आप रास्ता भटक गये हो.फिरसे नीचे उतरकर नालीके रास्तेसे जाओ.नर्मदे हर! म्हणून त्यांचे आभार मानून योग्य रस्त्याला लागलो.
एक लिटर पाणी संपत आले तरी दूरवर मानवी वस्ती दिसत नव्हती.ऊन्हाचा ताव वाढत चालला होता.वाराही रूसला होता.खेरवानी गावाच्या पुढे पाच आम्रवृक्ष एकाच ठिकाणी आहेत तेथे विश्रांतीसाठी थांबलो.आज बहुतेक परिक्षेचा दिवस असावा.बालभोगही झाला नव्हता.एवढ्यात काही ग्रामस्थ येताना दिसले त्यांनी जवळचा रस्ता दाखवला.महाराज! ये शॉर्टकट है यहासे आप आधे घंटेमें सेमलेट पहूंच जाओगे.मैय्याने बुडत्याला आधार दिला.तोल सांभाळत.पाऊलवाटेने सेमलेटला पोहोचलो.बालभोगच्या शेवटच्या माझ्या वाट्याच्या राहिलेल्या पोह्याच्या डिशवर ताव मारला.परिक्रमा पथावर चालताना खाण्यापिण्या सारख्या क्षुल्लक गोष्टींची काळजी करू नको.नाम घे! चालत रहा! असा जणु संदेशच मैय्याने दिला.
एवढ्यात सेवाव्रती म्हणाले,अब यहांसे शामतक आपको कुछ नहीं मिलेगा यहीं रूको दोपहर की भोजनप्रसादी पा के जाना.आप आरामसें भादल पहूंच जाओगे.वेळ होताच नळावर ( ईकडे हॅंडपंपला नळ म्हणतात) कपडे धुऊन घेतले.हातरूमालसुध्दा धुण्याची सवय नसलेल्याने धोतर,बंडी धुऊन घेतले.स्वावलंबनाचा धडा गिरवला.
भोजन प्रसादी बनवण्यात मदत केली.संवादात समजले की,या प्रदेशात आजही धर्मांतराचे प्रकार घडतात त्याला उत्तर म्हणून येथील गावकऱ्यांनी मंदिर उभारणी केली आहे आणि ते यथाशक्ती परिक्रमावासियांची सेवा करतात.स्वत:कडे धनाची वानवा असतानासुद्धा आमिषांना बळी न पडता धर्मासाठी सेवाव्रत करणारी ही मंडळीच खरी धनवान आहेत याची खात्री पटते.
मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमारेषेवर भादल या एकाच नावाची गावे दोन्हीकडे आहेत.जाताना डांबरी रस्ता व पायवाट असे दोन पर्याय आहेत.पायवाटेचा पर्याय निवडून निघालो.अतिशय तीव्र उताराची पायवाट आहे.काही ठिकाणी अक्षरशः बसून,तर काही ठिकाणी रांगत जावे लागते.महाराष्ट्रातील ता.धडगाव जि.नंदुरबार येथील भादल गावात पोहोचलो.
सकला परदेशी यांच्याकडे त्यादिवशी आम्ही सर्व मिळून ३० मूर्ती होतो.पाणवठा जवळपास ५०-६० मी.खाली होता.रोजचे वापराचे व पिण्याचे पाणी या जीवनावश्यक बाबींसाठी किती कष्ट सोसावे लागतात ते समजले.अशा खडतर परिस्थितीत सकलाची आई ,त्याची माहेरपणासाठी आलेली गरोदर बहिण या दोघींनी त्यादिवशी सर्वांसाठी जात्यावर दळलेल्या मका,नाचणीची भाकरी व उडीद,मुगाचे वरण असा स्वयंपाक सिध्द केला.स्वत:चे रोजचे जीवनसुध्दा अत्यंत कष्टप्रद असताना येणाऱ्या परिक्रमावासियांची निरलस, निस्वार्थी भावाने सेवा करणे ही खरेतर उच्चकोटीची भक्तीचं होय.
गर्भश्रीमंत तीर्थक्षेत्री जाऊन वातानुकूलित स्पेशल दर्शन रांगेत ताटकळून काही सेकंद मूर्तीदर्शन करून जे पुण्य मी पूर्वी मिळवू पहात होते ते या परिक्रमेत विना खर्च मैय्या कृपेने अशा निरहेतुक प्रेमळ मूर्तींच्या दर्शनाने व सहवासाने मला मिळत होते हे माझे भाग्यच नव्हे काय?
ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म|परस्परांच्या सुखाचे वर्म||
समजूनी करील जो त्याग उद्यम|तोचि सेवाभावी समजावा||
. या सर्व सेवेकऱ्यांना शतश: नमन करून निद्रावश झालो.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि.४/५/२५
वैशाख शु.७ शके १९४७
भाग १२
पाण्याची अनुउपलब्धता पाहता आज अंघोळ न करता निघालो. अर्थात वाटेत अनेक ओढेनाले लागणार त्यात अंघोळ करता येईल हे नक्की.तासाभराच्या चालीनंतर एक मोठा ओढा लागला.आंघोळ करून पूजापाठ पूर्ण केला.परिक्रमेतील खप्परमाल हा सर्वात कठीण चढ आज पार करावयाचा होता.आता खप्परमालला जाण्यासाठी पूर्ण डांबरी रस्ता तयार झाला आहे.रस्ता पूर्ण चढाचा आहे.ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या होत्या.आमच्यासमोर ४०-५० मी.वर वरून मोठे दगड गडगडत येऊन थांबले.त्यामुळे लक्षपूर्वक चालावे लागत होते.शेळ्या-बकऱ्या मात्र निर्धास्तपणे उंच कड्यावरील झाडपाला खाण्यासाठी हुंदडत होत्या.रस्त्यावर वाहने मात्र अगदीच तुरळक दिसत होती.४ तासांच्या चढाईने घामाची आंघोळ झाली होती.१०.३० ला श्री उत्तम सेवा धाम आश्रम खप्परमाल येथे
पोहोचलो.आश्रम सर्व सुविधांनी युक्त आहे.आंघोळ करून शारीरिक शिणवटा घालवला.शेजारीच जिल्हा परिषदेची शाळा होती.
प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा ।। धृ ।।
तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा-पाणी
आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाउन बसा ।। १ ।।
रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा ।। २ ।।
सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा ।। ३ ।।
ही उमाकांत काणेकर यांची कविता गायली जात होती.बालपण जसे निरागस असते तद्वत सारे जीवन निरागस होणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.निष्पाप,शुध्दभाव,सर्वांवर प्रेम करणे,भूतदया हे गुण अंगी बाणण्यासाठी मला अधिक प्रयत्नशील व्हावे लागेल.हे उमगले.
आज एकादशी असल्याने (ग्यारस हा हिंदी शब्द) आश्रमात खिचडी प्रसादी होती.प्रसादी घेऊन निघालो.भमाना येथे मुक्काम करावा असे नियोजन होते.पण परिक्रमेत आपण काहीच करत नसतो.मैय्या सर्व करवून घेत असते याचा आज प्रत्यय येणार होता.
भमाना १० किमी असा बोर्ड वाचून पुढे निघालो आणि उजव्या पायातील सॅंडलचा सोल निघाला.आता २-३ दिवस धडगाव पर्यंत काही सोय नाही असे भेटणारे गावकरी सांगत होते. धडगाव येईपर्यंत आपली धडगत नाही असा प्रासंगिक विनोद करून चप्पल घासत हळूहळू चाललो होतो.तेथे मोटरसायकलवरून वस्तू विक्रेते फिरतात.त्यापैकी एकाने माझे घर येथे जवळच आहे बहुतेक माझ्याकडे फेविक्विक असेल तुम्हाला देतो असे म्हणून तो पुढे गेला.त्याच्या घराजवळ पोहोचलो पण त्यांचेकडे फेविक्विक नव्हते.तो म्हणाला पुढच्या टपरीत असेल मी जाऊन पहातो तुम्ही मागून या.तो पुढे जाऊन टपरीपाशी थांबला सुदैवाने तेथे फेविक्विक होते.ते घेऊन सोल चिकटवला १० मि.थांबलो.काम फत्ते झाले.
काय झाले कुणास ठाऊक पण भमानाचा फलक काही दिसेना.मी आणि दिपक विषे बरोबर होतो.अंधार दाटू लागला दूतर्फा जंगल,मानवी वस्तीचा मागमूस नाही.मध्येच एखाद दुसरी मोटर सायकल जा-ये करत होती. संकटात देवाचा धावा अधिक जोराने होतो म्हणतात त्याप्रमाणे नर्मदे हरचा नामघोष वेगाने होऊ लागला.एक छोटे घर दिसले.मिणमिणता दिवा जळत होता तेथे चौकशी केली तर भमाना दोन-तीन किलोमीटर मागे राहिल्याचे कळले. पुढे दोन-तीन किलोमीटरवर सावरिया हे गाव लागेल तेथे घरं आहेत सोय होऊ शकेल असा दिलासा मिळाला.
आज प्रथमच नाईलाजाने सूर्यास्तानंतर चालावे लागत होते.वाटेत आणखी ४ मूर्ती भेटल्या. ते भमानाच्या आश्रमात जाऊन आले होते पण तेथे लाईट व पाण्याची सोय नसल्याने ते पुढे आले होते असे कळले. समदु:खी झटकन एकत्र येतात त्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकाच चालीत विजेरीच्या प्रकाशात चालू लागलो. आता मनाशी एक ठरवले की येणाऱ्या गावात पहिल्या घरातच काय तो सोक्षमोक्ष लावायचा.
जवळपास सात वाजले अंधाराचे घनदाट हे विशेषण सार्थ होऊ लागले.एका वळणावर खांबावरील मिणमिणता लाईटचा दिवा दिसला आणि पावलांनी वेग पकडला.सावरिया गावातील सुरुवातीच्याच टपरी वजा दुकानात थांबलो. एक माताराम दुकानात होत्या. त्यांना दुकानाच्या पुढे ओसरीवर आजची रात्र विश्रांती घेऊ का असे विचारले त्यांनी लगेच होकार दिला. शेजारीच हँड पंप होता त्यामुळे मुख्य सोय झाली होती. आम्हा सहा जणांपैकी तिघेजण तिथे न थांबता पुढे निघाले. आता मी दीपक विषे आणि भरत दास तिघेजणच राहिलो.
आज प्रथमच उघड्यावर झोपावे लागणार, त्याची मानसिक तयारी केली आणि खिचडी बनवण्यासाठी जो शीधा लागतो तो त्या दुकानातूनच घेऊ लागलो आम्ही खिचडी बनवतो असे त्यांना सांगितले. त्या मातारामनी लागणारा सर्व शिधा बांधला आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊक क्षणात त्या म्हणाल्या थांबा मीच तुम्हाला खिचडी करून देते. स्वतःवर जबाबदारी घेऊन एक काम मैय्याने अगदी सहजतेने त्या माताराम करवी करून दिले.
पूजा पाठ झाला. मातारामनी चविष्ट खिचडी करून आणली. भोजन प्रसादी झाली. आता आम्ही आसन लावून निद्राधीन होणार एवढ्यात दुकानाचे मालक दारासिंग तेथे आले.
महाराज! आप लोग यहा बाहर सोयेंगे ऐसा कभी होता है क्या? अपना इतना बडा घर किसके लिये है, पीछे ही तो है, चलो मेरे साथ असे म्हणून ते आम्हाला त्यांच्या औरस चौरस घरात घेऊन गेले. पूर्णपणे सागवानी लाकडाचे दहाखणी मोठे घर होते.
थोडक्यात भमाना येथे लाईट व पाण्याची सोय नसल्याने मैयाने आम्हाला पुढे आणले आणि आमची सोय केली हे नक्की. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो करांनी.म्हणजे यापेक्षा वेगळे काय असणार?मैय्याचे नामस्मरण करत निद्राधीन झालो.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि.४/५/२५
वैशाख शु.७ शके १९४७
नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
भाग १४
शुलपाणीच्या जंगलात सज्जन संगती घडत होती. पहाटेच्या समयी मोरोपंतांची केकावली आठवली
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो
पहिल्या चरणाप्रमाणे सुसंगती घडून सुजन वाक्य कानी पडतच होते. पुढच्या टप्प्यातील बुद्धीचा कलंक झडणे आणि विषयांची नावड उत्पन्न होणे यासाठी सत्संगामध्येजी श्रवण भक्ती झाली आहे त्याचे चिंतन आणि मनन या गोष्टी मीच करणे आवश्यक आहे. साधू जनांच्या कमलपदारविंदाचा आश्रय मला कायम मिळो, माझा चुकांमुळे यदा कदाचित त्यांनी मला नाकारलेच तरी हट्टाने मी तिथेच अडून राहीन आणि तरीही साधू चरण वियोग झाला तर मी पश्चातापदग्ध रडावे आणि तरीही मी त्यांच्या चरित्र गायनात अर्चन भक्तीमध्ये रमून जावे. अशी ही अर्थ गर्भ रचना सकाळी सकाळीच आठवली.
आजही दासजी यांची संगत घडणार होती. माझा नित्य पाठ झाला. आम्ही पुढील मुक्कामी पोचण्यासाठी प्रस्थान ठेवले.चर्चा, संवाद सुरू होता.बरोबरचे काही परिक्रमावासी सुद्धा आता दासजी यांच्या बोलण्याकडे आकृष्ट होऊ लागले होते.
त्यातीलच एकाने त्यांना प्रश्न विचारला की,साधकांची दिनचर्या कशी असावी? साधक या शब्दाकडे विशेषत्वाने लक्ष वेधून दासजी यांनी साधक म्हणजे काय यावर विवेचन सुरू केले.
संसारातील त्रिविध तापांनी त्रस्त झालेला सांसारिक ज्यावेळी पश्चात्तापदग्ध होऊन प्रभूचरणाशी लीन होऊ पहातो त्यावेळी त्याचे बध्द ते साधक या वाटेवरील मुमुक्षत्वमार्गे टाकलेले ते पहिले पाऊल असते.सूर्योदयानंतरही लोळत पडणारा तो पहाटे लवकर उठतो.शारिरीक शुध्दतेनंतर माफक व्यायाम,योगासने व प्राणायाम हा त्याचा ध्यास बनतो.स्नानोत्तर देवपूजा करताना ज्या देवतेची पूजा करतो त्याची मूर्तीपूजा योग्य उपचारांनी करतो त्या त्या देवतेचे गुणगान करून आपणही त्या गुणांचे पाईक होण्याचा निश्चय करतो. आपले शारीरिक बल वाढावे,उत्साह टिकून राहावा,आरोग्य निरामय राहावे यासाठी घ्यावयाचा सर्व इंद्रियांचा आहार चौरस, सात्विक आणि परिमित आहे ना ईकडे लक्ष देतो. म्हणजेच रसनेने ग्रहण करावयाचा आहार रसपूर्ण राहील असे पहातो, डोळ्यांनी काय पहावे,कानांनी काय ऐकावे यांचा विधी निषेध पाळून इंद्रिय संयम करतो.व्यवहारात त्याने जो व्यवसाय पत्करला असेल नोकरी,धंदा,व्यवसाय,शेती,इत्यादी, तो करताना सचोटी,कार्यमग्नता,कार्यकौशल्य यांसारख्या गुणांनी त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचा तो आवडता बनतो. असे विवेचन चालू असतानाच खर्डी-राजबर्डी-धडगाव या रस्त्यावर एक व्यक्ती मोटरसायकल वरून मुलांना सोडून येत होती पुन्हा येऊन परत दुसऱ्या मुलांना घेऊन जात होती. उत्सुकतेने आमच्यापैकी एकाने त्याला तुम्ही काय करत आहात असे विचारले तर, ती प्राथमिक शिक्षक व्यक्ती उत्तरली की, अहो! या भागात शैक्षणिक उदासीनता फार आहे त्यामुळे घरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन यावे लागते. दासजींनी त्या शिक्षकाची ही कृती सुद्धा साधना या सदरात मोडते असे सांगितले. दुपारच्या भोजन प्रसादीची वेळ झाली होती रस्त्यावरील एका शाळेत थांबलो मुलांना ज्या उसळीमध्ये कडधान्याचा दाणा शोधावा लागत होता अशी पातळ जळजळीत उसळ आणि जाड अर्ध कच्च्या भाकऱ्या असे भोजन होते. परिक्रमा सुरू केल्यापासून अशी जहाल भोजन प्रसादी मिळाली नव्हती. या ठिकाणी आपल्या कर्तव्यात कसूर करणारे भेटले. दास जी म्हणाले की आपल्या कर्तव्यात कसूर करणारा आसुरी वृत्तीचाच समजावा.वर आपल्या डोळ्यासमोर घडलेली दोन्ही उदाहरणे अनुक्रमे सात्विक व आसुरी वृत्तीची आहेत. आपले विवेचन त्यांनी पुढे चालू केले.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः
या श्लोकपंक्ती प्रमाणे तो लोकमान्य होण्याचा प्रयत्न करतो आणि एकांता बरोबरच मर्यादित प्रमाणात तो लोकांत मिसळतो. कोण ब्याद आली आहे अशा नजरेने त्याच्याकडे कोणी पाहत नाही तर तोही लोकांकडे त्या नजरेने पाहत नाही.जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा देवद्वारी साफसफाई,बागेतील वृक्षलतांची व गायी वासरांची देखभाल करतो. आपल्या शरीराच्या बरोबरच निसर्गाची आणि आपल्या परिसराची काळजी घेण्याची त्याची वृत्ती बहरू लागते.आपली असंग्रहवृत्ती वाढविण्यात तो प्रयत्नशील असतो.नामस्मरण आणि गुरू वंदना हा त्याचा सहजभाव बनतो. कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्याच्या भानगडीत तो पडत नाही. जे काही घडत आहे त्याकडे तो साक्षी भावाने पाहू शकतो.अद्वैत ग्रंथवाचन, प्रासादिक सत्संग यांचा लाभ घेतो.
थोडक्यात उठल्यापासून झोपेपर्यंत आपणाकडून जी कोणती कृती होईल ती सात्विक वृत्तीने ईश्वरार्पणभावाने करून निश्चिंत मनाने तो निद्राधीन होतो.
साधक या सदराखालील व्यक्तीचे दासकृत हे विवेचन ऐकून भारावलेल्या अवस्थेतच धडगाव येथील आश्रमात विश्रांतीसाठी आम्ही प्रवेश केला.
प्रकाश फडके
सांगली
रविवार दि.११/५/२५
वैशाख शु.१४ शके १९४७