Saturday, July 18, 2026

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
                  भाग १

     शनिवार दि.११ मे २०२४. मे महिन्यातील कडकडीत उन्हाचा त्रास वाचावा म्हणून मी आणि शिंदे पहाटे पाच सव्वा पाचचे दरम्यान सांगली येथील आमच्या घरातून तुंग येथील मारुती मंदिरात जाण्यासाठी निघालो. शक्तीची देवता मारुतीरायाच आपल्याला ताकद देणार त्या जोरावर दोन-सव्वादोन तासात तुंगाला मंदिरात पोहोचलो. जाताना वाटेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य निरामय राहण्यासाठी व्यायाम,वाचन,योगाभ्यास,ध्यानधारणा अशा गोष्टी आवश्यक असल्याच्या चर्चा चालू होत्या.
     मारुतीरायांना साष्टांग दंडवत घातला आणि प्रदक्षिणामार्गावर प्रदक्षिणा घालत असताना माझ्या डोक्यात नर्मदा परिक्रमेचा विचार पिंगा घालू लागला. प्रदक्षिणामार्गावर परिक्रमेचा विचार पिंगा घालताच मन त्याची पेरणी शोधू लागले. सन २००८ मधील माननीय प्रतिभाताई आणि सुधीर दादा चितळे यांचे नर्मदा  परिक्रमे विषयीचे अनुभव कथन आणि ब्रह्मलीन जगन्नाथजी कुंटे उर्फ स्वामी अवधूतानंद यांच्या टिळक स्मारक मंदिरातील तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या सुपीक मातीत हे बीज दडलेले दिसले. परतीच्या प्रवासात शिंदे बरोबर याचा उच्चार झाला आणि त्यानेही लगेच त्याला दुजोरा देऊन होकार भरला.त्याने केवळ होकारच भरला नाही तर लगेच संध्याकाळी जवळच्या मित्रांना फोन करून कल्पना सांगितली व्हाट्सअप ग्रुप तयार केला. मी ही संध्याकाळी घरात हा विचार बोलून दाखविला क्षणात होकार आला आणि बीज अंकुरण्यासाठी जणू मृगवर्षाव झाला.
     बीज ते फल हा प्रवास सुफल संपूर्ण होण्यासाठी काय करावे काय टाळावे वगैरे यम,नियम विधी निषेध यांची उजळणी सुरू झाली.समाज माध्यमे, मुद्रित साहित्य यामधील विपुल माहिती धुंडाळण्या व्यतिरीक्त ज्यांनी प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांच्याशी बोलणे,शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटणे अशी आखणी केली.माझे मेव्हणे सुहासराव मराठे यांनी परिक्रमा केली असल्याने त्यांचेशी संपर्क केला.पुण्यातील विवेक चोळकर यांना भेटलो.त्यांनी स्वतः तयार केलेला पायी परिक्रमेचा फ्लेक्स नकाशाच मला दिला.याशिवाय विवेक दंडवते,बिमलखेडकर यांचेशी बोलणे झाले.चोळकर यांच्यामार्फत साने यांचा परिचय झाला त्यांची एक परिक्रमा झाली असून‌ ते दुसरी परिक्रमा करणार असल्याने त्यांचीही भेट घेतली.
ढोबळ रूपरेषा तयार झाली.लगोलग त्याची शक्य तितकी अंमलबजावणी सुरू केली.त्यामध्ये रोज वजन घेऊन  किमान १० किमी चालणे,२०० पायऱ्या चढ उतार, सूर्य नमस्कार,योगासने याशिवाय
१)    थंड पाण्याने आंघोळ २) स्वतःचे कपडे स्वतः धुणे,३) ताट,वाटी घासणे ४) तोंडावर पांघरूण घेऊन झोपणे.५) लाईट सुरू असताना झोपणे. ६) बिन उशीचे झोपणे ७) गादीवर न झोपणे ८) मोबाईल व टिव्हीचा कमीतकमी वापर ९) वृत्तपत्र न वाचणे याचा सराव सुरू केला. या भौतिक, शारीरिक अभ्यासाबरोबरच,एखाद्या मंदिरात डोळे मिटून शांत बसणे, आजूबाजूचा कोलाहल न ऐकणे, सकारात्मक उर्जा स्थानांना भेटी देणे, संतसाहित्य व अद्वैत ग्रंथ वाचन असा शारीरिक,मानसिक व बौद्धिक तंदुरूस्तीचा अभ्यास सुरू केला.मौनाची आवश्यकता ठळकपणे समोर आली पण कंठ फुटल्यापासुनच्या बडबडीच्या सवयीने मौनाचा सराव‌ म्हणावा तसा झाला नाही.
   या बाह्य आणि आंतरिक परिवर्तनाचा सराव सुरू होता.बाह्यपरिवर्तन भौतिकता व बुध्दीशी निगडीत असल्याने त्याचा सराव अवघड वाटत नव्हता परंतु आंतरिक परिवर्तन आध्यात्मिकता व भावनाविश्वाशी निगडीत असल्याने तेथे चाचपडणे सुरू होते.This is neither a trek nor a marathon run but a spiritual walk along the banks of holi river Ma Narmada हे वाक्य मनात घोळत होते.संपूर्ण शरणागत झाल्यानंतर आपल्या देहाकडून परिक्रमा पूर्ण करवून घेतली जाते. निसर्ग,विश्व,ब्रम्हांडाशी तादात्म्य होणे हा spirituality उर्फ अध्यात्माचा एक आयाम आहे.आपल्या पातळी नुसार ही तादात्मता साधता येते.
    एके दिवशी नित्योपासनेतील दासबोधातील सच्छिष्य लक्षण समास समोर आला आणि
म्हणोनी साधन अभ्यास आणि सद्गुरु| सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू| सत्कर्म आणि सद्वासना पारू| पाववी भवाचा|
सदुपासना सत्कर्म |सत्क्रिया आणि स्वधर्म | सत्संग आणि नित्यनेम| निरंतर| या ओव्यांनी मार्गदर्शन केले.शुध्द आचार,उच्चार आणि विचार,निष्ठा,दक्षता,उदारता,तत्परता यांसह शक्ति,युक्ती,बुध्दी,धारिष्ट्य,दृढ संकल्प,कायाक्लेश,लीनता अंगी बाणवली पाहिजे याची जाणीव झाली.हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद नर्मदा मैय्या आणि तो सर्वसाक्षी ईश्वर यांचेकडे मागितली. ज्या ज्या वेळी हे शिव धनुष्य मला पेलेल का अशी शंका आली त्यावेळी गीतेतील नवव्या अध्यायातील
अपि चेत्सुदुराचार: भजते मामनन्यभाक्
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:
(असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो
मानवा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय)
या ओळींनी या दुराचाऱ्याच्या मनातील निश्चय ज्योत तेवत ठेवली.
  कोणतीही गोष्ट करताना काहीतरी उद्देश असतोच.माझा परिक्रमेचा उद्देश शक्य तेवढे बाह्य व आंतरिक परिवर्तन स्वतःमध्ये घडविणे,नर्मदा मैय्या व त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे आज वरच्या समृध्द जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि भावगीताच्या भाषेत
मागणे न काही सांगण्यासी आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो हे गुज मैय्याला सांगणे त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मला भजनदंग राहू दे अशी प्रार्थना करणे असा होता.
     नोव्हेंबर मध्ये परिक्रमा उचलावयाची होती त्यामुळे जुलैमध्ये  रेल्वे तिकीट आरक्षण करणे भाग होते. तिकीट आरक्षण करताना बुद्धिच्या आकलना पलीकडच्या काही गोष्टी घडल्या त्या पुढील भागात.
                             प्रकाश फडके
                               सांगली
शनिवार १५/३/२०२५
फाल्गुन वद्य १ शके १९४६.

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
                                          भाग २

       अत्यंत उत्साहाने परिक्रमेची पूर्वतयारी सुरू होती. मागील भागात सांगितल्याप्रमाणे आता रेल्वे रिझर्वेशनची गंमत सांगतो. पुण्यातून खांडवा येथे जाण्यासाठी रोज पुण्यातूनच सुरू होणाऱ्या दोन ट्रेन आहेत ११०७७ आणि १२१४९.
     यापैकी ११०७७ झेलम एक्सप्रेस खांडवा येथे अवेळी पोहोचते. त्यामुळे त्याला प्राधान्य न देता १२१४९ पुणे ते दानापूर या गाडीचे आरक्षण करावे असे ठरले. त्यावेळी १२० दिवस अगोदर  आरक्षण सुरू होत असे त्यामुळे जुलैमध्ये आरक्षण सुरू होण्याच्या दिवशी आठ वाजता गाडी सर्च केली तर १२१४९ या गाडीचे आरक्षण पुढील सुचनांपर्यंत स्थगित केले आहे असा मेसेज येत होता. 139 या रेल हेल्पलाइनला फोन करून काही उपयोग झाला नाही. शेवटी माझे रेल्वेतून रिटायर झालेले कोल्हापूरचे मित्र शेटे यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. चौकशीअंती असे कळले की काही काळासाठी आरक्षण स्थगित ठेवले आहे लवकरच सुरू होईल. सर्वानुमते तोपर्यंत थांबण्याचे ठरले. काही दिवसानंतर या गाड्यांचे आरक्षण 18 जुलैपासून सुरू होईल असे नोटिफिकेशन आल्याचे समजले.
        आरक्षण सुरू झाल्या झाल्या दहा मिनिटातच फुल होऊन वेटिंग लिस्टला कसं जातं हे न सुटलेले कोडं डोक्यात घेऊन १८ जुलै रोजी सकाळी आठ वाजता IRCTC APP उघडले तर नेमकी १२१४९ ही गाडी सोडून इतर गाड्या ओपन झाल्या होत्या. सर्वांना फोन करून सांगितल्यानंतर शेवटी आता अधिक वाट न बघता ११०७७ झेलम एक्सप्रेसचे रिजर्वेशन करावे असे ठरले. त्याप्रमाणे मी पुढे गेलो आणि पेमेंट करण्याचा ओटीपी सुद्धा एंटर केला परंतु पेमेंट फेल झाल्यामुळे रिझर्वेशन झाले नाही बँकेतून माझी रक्कमही वजा झाली नव्हती. पुन्हा पाहतो तर तोपर्यंत १२१४९ या आम्ही ठरविलेल्या गाडीचे रिझर्वेशन ओपन झाल्याचे दिसले लगेच पुन्हा सुरवात केली आणि आश्चर्य असे की आम्हाला पाहिजे त्या गाडीचे तिघांचेही कन्फर्म रिझर्वेशन मिळाले.
     ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होणे, बँकेतून माझी रक्कम वजा न होणे आणि नंतर आम्हाला हवी ती गाडी ओपन होऊन त्याचे निश्चित आरक्षण मिळणे या घटनेतून मी असा बोध घेतला की, नर्मदा मैया तुमची परीक्षा पाहते पण त्यात तुम्ही उतरला तर ती तुम्हाला नक्कीच कडेपर्यंत पोहोचविते.
मनी धरावे ते ते होते| विघ्न अवघेचि  नासोन जाते|
कृपा केलीया रघुनाथे| प्रचित येते|| या ओवीचा प्रत्यक्षानुभव वेगळा काय असणार.
   अन्यथा ओटीपी एंटर करूनही पेमेंट फेल होण्याच्या ७% (ही माहिती गुगलच्या सौजन्याने) एवढ्या कमी शक्यतेत माझे पेमेंट फेल व्हावे बँकेतून पैसेही वजा होऊ नयेत आणि पाहिजे त्या गाडीचे रिझर्वेशन मिळावे हा योगायोग नक्कीच नाही.
       या घटनेनंतर माझी श्रध्दा अधिक दृढ झाली, की खरंच नर्मदा मैया माझ्याकडून नक्की परिक्रमा पूर्ण करून घेईल. प्रवासाची अनिश्चितता संपली. परिक्रमे दरम्यान सुटसुटीत पोशाख कसा असावा याची चर्चा सुरू झाली. धोतर-पांढरा अंगरखा,पायजमा-पांढरा शर्ट,लुंगी-शर्ट,धोतर-बंडी असे अनेक पर्याय समोर होते. सुटसुटीत पणाच्या दृष्टीने रामदासी पद्धतीने छाटी प्रकाराचे धोतर नेसून वर बंडी घालावी असे ठरले.सर्वकाळ वजन पाठीवर वागवावयाचे असते त्यामुळे पाठपिशवीचे वजन कमीतकमी ठेवण्यासाठी धोतर-बंडी दोन जोड,पंचा,आंघोळीचे कपडे,स्वेटर,स्लिपींग बॅग,थर्मल वेअर,हातमोजे,पायमोजे,मोठे सुती रूमाल,ताट,पेला,छोटी कात्री,सुई दोरा, आवश्यक औषधे,पूजा साहित्य,नर्मदा मैय्याची तसबीर,कमंडलू,दंड‌ असे कमीतकमी साहित्य अंतिम केले. सर्व मिळून ७-७.५ कि.वजन झाले.शारिरीक गरजांसाठी अत्यावश्यक साहित्याचे ओझे खरंतर कमी आहे पण त्यात चोचले पुरवण्यासाठीचे साहित्य मिळवले तर ते ओझे आपणास वाकवते याचा धडा मिळाला.
    दैनंदिन व्यायाम,उपासना,वाचन,मनन सुरू होतेच पण आता सर्व लक्ष प्रवासाचा दिवस कधी उजाडतो याकडे होते. पुढील भागात प्रत्यक्ष मैय्या दर्शन व परिक्रमा उचलली त्याचे कथन पाहू.
                              प्रकाश फडके
                                सांगली
गुरूवार दि.२७/३/२०२५
फाल्गुन वद्य १३ शके १९४६

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
                   भाग ३

      सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान खांडवा स्टेशनला उतरलो तेथून नर्मदा परिक्रमा उचलण्यासाठी ओंकारेश्वरला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. खांडवा हे आपल्या सर्वांचे लाडके गायक किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगुली यांचे जन्मगाव. बसमधून जाताना त्यांचे स्मारक झर्रकन मागे पडले आणि
आनेवाला पल जानेवाला है,हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है. हे गोलमाल चित्रपटातील गीत नकळत ओठांवर आले वर्तमानकाळात जगावे असा सुंदर संदेश देणारे गुलजार यांचे शब्द.
एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं
वहाँ दास्तां मिली,लमहा कहीं नहीं
थोड़ा सा हँसाके,थोड़ा सा रुलाके
पल ये भी जाने वाला हैं हे शब्द किती सहजतेने, येणारा क्षण जाणार आहे तो परत येणार नाही, त्यामध्ये कधी डोळे दु:खाश्रूंनी ओले होतील तर कधी आनंदाने विस्फारतील असे सांगतात.त्यामुळेच याक्षणी घडणारी कहाणी अशी घडवू की ती प्रेमादरपूर्वक सर्वांना सांगता येईल.नर्मदा परिक्रमेदरम्यान जो काळ व्यतित होणार आहे त्यात वर्तमान भान सतत जागृत राहून त्यामधून अशी कहाणी घडू दे अशी मैय्याला प्रार्थना केली आणि ओंकारेश्वरला उतरलो.
      गजानन महाराज आश्रमात खूप गर्दी होती.त्यामुळे आम्ही आमची व्यवस्था दुसरीकडे लावली.
      परिक्रमेच्या नियमानुसार नर्मदामैय्याचा प्रवाह एकदा परिक्रमा उचलल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत ओलांडायचा नसतो त्यामुळे मंधाता परिक्रमा लगेचच करण्याचे ठरविले.
     नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर गेलो.मध्यम वेगाने वहात असणारा पुण्यसलिलेचा प्रवाह,मांधाता पर्वत असे निसर्गनिर्मित दृश्य समोर होते तर उजव्या हाताला ९५० मी. लांब  तर ३३ मी उंच धरण,झुलता पूल असे मानवाच्या निर्मितीचे सुंदर दृश्य होते.झुलता पुल पार करून ओंकारेश्वराचे दर्शन घेतले.मनोभावे नमस्कार केला. आद्य शंकराचार्य रचित निर्वाण षटक गुणगुणताना
नमे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानंद रूप: शिवोहम् शिवोहम्
या ओळींकडे नर्मदा परिक्रमेच्या पूर्वसंध्येला विशेषत्वाने लक्ष जाऊ लागले.या अत्युच्च कोटीच्या स्थितीतील साधू संत
परिक्रमे दरम्यान भेटावेत,या सत्संगामुळे माझ्यात ठासून भरलेले हे सर्व दोष निदान सैल व्हावेत असे वाटू लागले.
     त्याच भावावस्थेत मांधाता परिक्रमा सुरू झाली.( अंतर अंदाजे ७ ते ८ कि.मी.) परिक्रमा मार्गावर श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण १८ अध्यायातील ७०० श्लोक  कोरून लावले आहेत.मार्गात मैय्याच्या किनाऱ्या लगतचे रामकृष्ण मिशनचे साधना कुटीर लक्ष वेधून घेते.पुढे नर्मदा मैय्या व कावेरी नदी संगम आहे.संगमात स्नानासाठी गर्दी होती.
     पुढे आलो, ऋण मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.परिक्रमा मार्गातील १०८ फूट उंचीचा आद्य शंकराचार्यांचा पुतळा आजही शैव,वैष्णव,शाक्त,गाणपत्य,सौर अशा विविध संप्रदायांकडे अद्वैत दृष्टीने पहात असून सर्वांनी एकोप्याने रहावे असा प्रेमळ संदेश देत आहे असेच वाटते.
त्याच परिसरात भगवान शंकरांची ५० फूट उंच मूर्ती आहे.तीन मजली महादेव मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून मैय्या,कावेरी संगम दर्शन होते.वाटेतच मारूती मंदिरात पहुडलेल्या हनुमानाचे दर्शन होते.मार्गात शेवटी भग्नावस्थेतील सिध्दनाथ मंदिर आहे.मंदिरातील शिल्पकला डोळ्यांचे पारणे फेडते पण त्यांची अनैसर्गिक भग्नावस्था विषण्ण करते.
      परिक्रमेच्या अंतिम टप्प्यात विसाव्यासाठी थांबलो असता एक वृध्दत्वाकडे झुकलेल्या माताराम आमच्याकडे पाहून म्हणाल्या परिक्रमा उठा रहे हो क्या? मी होकार दिल्यावर त्याही विसावल्या आणि सुनो म्हणत सांगितले की, मैय्याके किनारे महज घुमना परिक्रमा नहीं है,आपस में बाते मत करो,मैय्या का नाम लेते चलो, मंदिर हो तो अंदर जा के प्रणाम करो,जितना हो सके ऑखें बंद करके मूर्ती की मानसपूजा करने की कोशिश करो,रास्तेमें दुसरोंने फेका हुआ कचरा भले मत उठाओ लेकीन हमसे कचरा ना हो इसका ध्यान रखो,खानपान के समय भरपेट मत खाओ,किसिसेभी,कुछ भी होने पर गुस्सा मत करो,मन में सबके प्रति हमेशा प्रेमभाव रखो,सुबह-शाम मैय्याकी आरती भावसे करो,मैय्या हमेशा आपके साथ है इसका पुरा भरोसा करो और आनंदभावसे परिक्रमा उठाओ, तो वो परिक्रमा सफल कराने की जिम्मेदारी मैय्या खुद संभालेगी तुम्हे चिंता की जररूत नहीं. असे म्हणून आम्हाला नर्मदे हर! म्हणून त्या निघून गेल्या.
      नर्मदा मैय्यानेच पूर्वसंध्येला येऊन उपदेशात्मक आशिर्वाद दिल्याने मन भावविभोर झाले‌ त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे म्हणत मैय्याला नमस्कार केला आणि उद्यापासून उचलावयाच्या परिक्रमेचे चिंतन करत निद्रावश झालो.पुढील भागापासून प्रत्यक्ष परिक्रमेतील अनुभव पाहू.
                             प्रकाश फडके
                               सांगली
शनिवार दि. २९/३/२०२५
फाल्गुन कृ.१५ शके १९४६
 
 नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
     ‌.           भाग ४

     आज १५ नोव्हेंबर २०२४ कार्तिक पौर्णिमा परिक्रमा उचलण्याची संकल्प पूजा करावयाची होती.वास्तविक अनेकांचे पूर्वानुभव पहाता ही पूजा अनिलदास महाराजांकडूनच करून घ्यावी असे वाटत होते.परंतू एका मित्राने अगोदर पासूनच एका गुरूजींना ठरवून ठेवले होते त्यामुळे त्यांची वाट बघत थांबलो होतो.फोनाफोनी चालू होती.आम्हाला घाटावर उभे राहिलेले पाहून एका मैय्याने विचारले सुध्दा की,अनिलदास महाराजांकडे जाणार आहात का? तो मित्रही म्हणाला जाणार असाल तर तुम्ही दोघे जा.पण भीड आड आली.पहिलेच दिवशी विकल्प नको म्हणून थांबलो.ते ठरविलेले गुरूजी आले पण त्यांनी सांगितलेल्या पूजेने मानसिक समाधान मिळाले नाही.घाटावरील पंडे कसे लूटतात याचा अनुभव आला.असो.कोणत्याही परिस्थितीत मन:शांती ढळू द्यायची नाही असे ठरविले असल्याने शांत रहाता आले.वास्तविक एका मैय्याने विचारणे व त्या मित्राने परवानगी देणे हे अनिलदास महाराजांकडून पूजा करून घेण्यासाठीचे संकेत होते पण भीड नडली.अर्थात त्या गुरूजींचा अनुभव चांगला न आल्यानेच हा तर्क सिध्द झाला.मैय्याला पुढे काय होणार हे ही माहित असते त्यामुळेच ती संकेत देते ते वेळीच ओळखण्याची बुध्दी व्हावी व कोणाचीही भीड बाळगू नये या धड्याने संकल्प पूजेनंतर नर्मदा मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाऊन नर्मदे हरचा गजर करत परिक्रमा मार्गावर पहिले पाऊल उचलले.
     नामस्मरण आणि गीता पठण यामुळे चालताना त्रास होत नव्हता.कोठी येथे एक रोटी बाबा आश्रमाचा फलक दिसला त्यांची माहिती अद्भूत आहे.मूळ नाव शिवोहम भारती असणारे एक रोटी बाबा ओरिसाचे रहिवासी असून इंग्रजीचे प्राध्यापक होते.९० च्या दशकात आध्यात्मिक ओढीने त्यांनी हृषिकेश येथे संन्यास दिक्षा घेतली व पदयात्रा करत ओंकारेश्वरला आले.१२ कोटी ॐ नम:शिवाय जपाची साधना त्यांच्या गाठीशी आहे.एक रोटी अभियान चालवून गरजुंना अन्नदान हा त्यांचा संकल्प गेली २५-३० वर्षे अव्याहतपणे सुरू असल्याने ते एक रोटी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची संधी मात्र मिळाली नाही.असो मैय्याची ईच्छा!
     १३ किमी चालून मोरटक्का येथील भक्तराज आश्रमात दुपारी १ चे दरम्यान पोहोचलो.भोजनप्रसादी घेतली.हात धुण्याची व भांडी धुण्याची जागा वेगवेगळी होती. परंतु एक परिक्रमावासी  त्याचा वापर बरोबर उलटे करत होते.तेथील सेवेकरी मैय्याने कडक शब्दात फलक वाचा असे सांगून त्याची जाणीव करून दिली.एरवी हा प्रसंग अपमानजनक वाटला असता पण परिक्रमा वासी या एका उपाधीने तो अपमान न वाटता
”उघडा डोळे बघा नीट” या उक्तीची आठवण करून देणारा वाटला.
     सद्गुरु अनंतानंद साईश यांचे शिष्य प.पू.भक्तराज महाराज यांच्या जीवन चरित्राचा अल्प परिचय झाला.भजन,भ्रमंती,भंडारा हे त्यांच्या भक्तीचे तीन आयाम आहेत. त्यांच्या उपदेशात ते म्हणतात
 आपल्या नित्य नैमित्तिक कर्मात रत असताना सुध्दा ईश्वर स्मरण असावे,कारण जर विस्मरण झाले तर धडपडल्या आणि
ठेचकळल्याशिवाय आपण एकही पाऊल टाकू शकणार नाही.
                     पू.भक्तराज महाराज.
(जिज्ञासूंनी https://bhaktarajmaharaj.org/index.html
ही लिंक पहावी)
       सायंकाळी मैय्या किनारी दर्शनाला गेलो.सुर्यास्त समयीचे रक्तवर्ण सूर्यबिंब मैय्याच्या पाण्यात प्रतिबिंबित झाले होते.प्रवाह,तरंग,तुषार हे सुध्दा लोभस लाली ल्याले होते.प्रतिबिंब पाण्याबरोबर हेलकावत होते तर बिंब स्थिर होते.बिंब प्रतिबिंबाचा हा खेळ न्याहाळत मैया किनारी शांत बसून राहिलो.तेथेच मैय्याची आरती व नर्मदाष्टकम गाईले.सायंकाळच्या रम्य वातावरणात आरती व नर्मदाष्टकमचे शब्द मनाचा ठाव घेत होते.पापनाशिनी मैय्याला नमन करुन  भावविभोर अंत:कर्णाने पहिला दिवस संपन्न झाला.
                           प्रकाश फडके
                            सांगली
रविवार दि. २०/०४/२०२५
चैत्र कृ.७ शके १९४७.




नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा
                                        भाग ६

          आश्रमात गर्दी होती त्यामुळे पहाटे चार पासूनच परिक्रमावासीयांची वर्दळ सुरू झाली.मैय्या किनारी जाऊन स्नान केले.माझी प्रात:कालीन नित्योपासना होईपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त परिक्रमावासी मार्गस्थ झाले होते.वास्तविक परिक्रमा नियमाप्रमाणे (अपवाद वगळता)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिक्रमा करावयाची आहे.असो.
        मंदिरातील काकड आरती झाली.पूर्व क्षितीज रक्तवर्ण होऊ लागले.पहाटवाऱ्याने लता,वेली आंदोळल्या,पाने सळसळली,मैय्याच्या पाण्यावर लोभस तरंग उमटले,घड्यात पाणी भरताना येणारे आवाज त्यात मिसळले अशा नादमय वातावरणात सूर्यदर्शन घेतले आणि मार्गस्थ झालो.
     कापूस,एरंड,पपई,केळीची शेते पार करत भट्यान गावात पोहोचलो.संत सियाराम बाबा या महान‌ विभूतीच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झाले आहे.१०४ वर्षीय बाबा कोणाच्याही आधाराशिवाय चालतात.अनेक वर्षे एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली आहे.ते आजही चष्म्याशिवाय रोज कित्येक तास रामचरित मानस वाचन करतात.कोणत्याही ऋतूत फक्त एक लंगोटी एवढेच त्यांचे वस्त्र आहे.सुखाचा मंत्र सांगताना ते म्हणतात,
सुखी वही होगा जिसने कामना,वासना,लालसाका परित्याग कर दिया.माझे भाग्य असे की,या तपस्वी संतांचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेता आले ( मी भाग्य शब्द याकरिता वापरला की त्यानंतर थोड्याच दिवसात ११ डिसेंबर २०२४ रोजी हे महात्मा ब्रह्मलीन झाले) त्यांच्या आश्रमात ते कोणाकडूनही फक्त रू. १० एवढीच देणगी स्विकारतात.या गावातील आश्रमात भक्तगण,परिक्रमा वासी यांचेसाठी अन्नदान चालते.निर्मोही,जितेंद्रीय,नि:काम अशा विभूतीमत्वांची भेट म्हणजे आपल्यातील  दोष खिळखिळे करण्यासाठी घातलेला घाव आहे.हा घाव या दोषांच्या वर्मी बसू दे अशी प्रार्थना केली. या पवित्र क्षेत्री बालभोग (न्याहरी उर्फ नाष्टा या शब्दाला परिक्रमेच्या परिभाषेत बालभोग असा  शब्द आहे) घेऊन लेपा या पुढील गावी जाण्यासाठी निघालो.
        भारतीताई ठाकूर या कर्मयोगिनीच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध अशा लेपा गावी पोहोचलो. या विभूतीमत्वाची भेट घ्यायचीच हे मी पूर्वीच निश्चित केले होते. परंतु तिथे गेल्यानंतर राम मंदिरात अशी चर्चा चालू होती की, डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील एक मोठा कार्यक्रम त्यांच्या प्रशालेमध्ये होणार आहे आणि त्यासाठी अनेक महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत व्यस्त असल्यामुळे बहुतेक भेट होणार नाही. आम्ही विचार केला की, आपण जे पूर्वीपासून ठरविले आहे त्यात आपणाकडून बदल नको. त्यामुळे श्रीराम मंदिर लेपा येथून चार किलोमीटर दूर लेपा पुनर्वास येथील नर्मदालय या भारतीताई ठाकूर यांच्या कर्तृत्व मंदीरात पोहोचलो. परिक्रमावासी भेटण्यासाठी आले आहेत असा निरोप गेला आणि आश्चर्य म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख, उप पोलीस प्रमुख यांच्याबरोबर चालू असलेली बैठक थांबवून त्यांनी आम्हाला भेट दिली. परिक्रमा वासी ही एक उपाधी धारण केल्यानंतर नर्मदा मैया च्या कृपेने आपले महत्त्व कसे वाढते याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला.त्यांच्या पायावर माथा टेकवून आशिर्वाद घेतला. परिक्रमेदरम्यान पाळावयाची पथ्ये परिक्रमेचे नियम याबाबत काही कानमंत्र त्यांनी दिले. आता भारतीताई यांनी संन्यास दीक्षा घेतली आहे.२००५ मध्ये उघड्या डोळ्यांनी केलेल्या परिक्रमेने त्यांचे मातृहृदय कळवळले आणि २००९ पासून त्यांनी नेमाड प्रांतातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.त्यांची आपल्या कार्याविषयीची तळमळ पाहून स्थानिक समविचारी जवळ आले आणि Nimar Abhyudaya Rural Management and Development Association (NARMADA). या अपत्याचा जन्म झाला. एका हाताच्या बोटावर मोजता येणारी विद्यार्थी संख्या आता चार आकडी झाली आहे.निवासी शाळा,गोशाळा,फिरती विज्ञान प्रयोगशाळा अशा उपक्रमातून रत्नपारख्याकडून हिऱ्यांना पैलू पाडले जात आहेत.
स्वाध्याय परिवारात
 नारायण मंत्र जपत हिंड तू जगात
कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात
असे भावगीत आहे. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीताई.
(जिज्ञासूंसाठी वेबसाईट लिंक)
(https://www.narmadalaya.org/main/History)
       महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु ल देशपांडे यांनी एकदा जाहीरपणे खंत व्यक्त केली होती की, नम्रपणे माथा टेकावा असे पायच आता दुर्मिळ झाले आहेत. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरील अशी कर्तव्यनिष्ठांची मांदियाळी पाहून ही खंत दूर होते.आपला जीवनोद्देश शोधण्यास,शोधला असल्यास त्यावर अविचल रहाण्यास मदत करणारे असे पुण्यात्मे भेटणे ही परिक्रमेची पर्वणी मनात साठवून आजचा दिवस माझे रितेपण भरता झाला.
                                                                    प्रकाश फडके
                                                                      सांगली
सोमवार दि.२१/४/२०२५
चैत्र कृ. ८ शके १९४७

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा 
                                                 भाग ७

       
      काल भारतीताईंशी झालेल्या संवादामुळे उत्साह आणि आनंद गुणित झाला होता.मैय्या किनाऱ्याने परिक्रमा सुरू होती.मैय्याचे विशाल पात्र,खळाळता प्रवाह,उडणारे तुषार,उठणारे तरंग हे पाहून नर्मदाष्टक मधील
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे||
हे प्रथम चरण सहजपणे गुणगुणले जाते. तुझ्या सहवासात माझ्यातील द्वेष,मत्सराचे रूपांतर प्रेम व सद्भावनेत होवो मला वाटणाऱ्या मृत्युदूताच्या भीतीचा तुझ्या रक्षणात्मक कवचाने नाश होवो.अशी प्रार्थना करता करता नावडाटोला गावात पोहोचलो.हे गाव माहेश्वरच्या बरोबर विरुद्ध किनाऱ्यावर आहे त्यामुळे येथून माहेश्वरचा अहिल्यादेवी होळकरांचा किल्ला व रेखीव घाट सुस्पष्ट दिसतात.शककर्त्या शालिवाहन राजाने स्थापन केलेल्या भव्य शिवमंदिरात दर्शन घेतले.सभोवती द्वादश ज्योतिर्लिंगांची स्थापना केली असल्याने त्यांचेही दर्शन होते.पुढे निघालो.
     आजची परिक्रमेची चाल बहुतेक मैय्या किनाऱ्याने असल्यामुळे खूपच आनंददायी प्रवास होत होता.प्रवासमध्यात थकवा पळावा आणि तरतरी यावी उद्देशाने मैय्यांच्या शीतल जलाने मार्जन केले.त्या शीतल संपर्काने थंडावलो आणि मनात विचार आला की,माझ्या संपर्काने कितीजण थंडावत,सुखावत असतील? उत्तर शोधू जाता या मार्गावर आपण खूप पिछाडीवर असल्याचे लक्षात आले.
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ||
हा श्लोक व दोन दिवसांपूर्वी दादा गुरुंनी सांगितलेले वाणीचे तप आठवले.माझी वाणी प्रेमळ होवो,माझा संपर्क सर्वांप्रती शीतल होवो असे विचार तरंग मनात येत होते.
     प्रवाहाकडे शांतपणे पहाताना माझे जीवन सुध्दा असेच प्रवाही असावे,साचलेपणातून येणारी निष्क्रियता त्यात नसावी,कोणताही अडथळा आला तरी प्रयत्नपूर्वक तो दूर करून‌ पुढे जावे असा संदेश मैय्याचा तो संथ प्रवाह देत होता.
    दर मजल करता करता ढालखेडी आश्रमात पोहोचलो.ग्रामस्थ एकजुटीने परिक्रमावासियांच्या सेवेत व्यग्र होते.डाळ खिचडी,मठ्ठा अशी सुग्रास भोजनप्रसादी घेऊन पुढे निघालो.वाटेत चिंचली या गावात मैय्या किनारी विशाल वटवृक्ष होता.वृक्षाच्या शीतल छायेत,डोळे मिटून शांत बसून राहिलो.मैय्याचा किनाऱ्यावर माझ्यासारख्या बध्दालासुध्दा अंतर्मुख करवणारी अशी नैसर्गिक रचना आहे. त्यामुळे या किनाऱ्याच्या उभय तटांवर अनेक सिध्दांची तपोभूमी आहे यात नवल ते काय? 
    पुढचा पांदीचा रस्ता एकावेळी जेमतेम एकच व्यक्ती जाऊ शकेल इतका अरुंद होता.त्याच रस्त्यावर माझ्यापुढे यमराजांचे वाहन असणारा एक रेडा झोकात चालला होता.माझ्या चाहुलीने तो सतत मागे वळून पहात होता,त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती.माझा वेग मी वाढवला तर तोही धावत होता,जमिनीवर दंड आपटून आवाज केला तर जोरात पळत होता
मी मंदावलो तर तोही संथावत होता,हा पाठशिवणीचा खेळ बराच वेळ चालू होता, पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता.काय करावे अशा विचारात असतानाच एक दुचाकीस्वार मागून आला आणि उजव्या बाजूच्या चढावर असणाऱ्या शेताच्या बांधावरून‌ गेला.मला मैय्याने रस्ता दाखविला, मी ही त्या बांधावरून पुढे गेलो आणि हा पाठशिवणीचा खेळ थांबला.
    ब्राम्हण गाव येथे पोहोचलो.आखीव,रेखीव,
घडवलेल्या काळ्या पाषाणाच्या सुंदर घाटावर मैय्याच्या जलातील शीतलतेने थंडावलेला वारा झुळझुळ वहात होता, सूर्यबिंब पश्चिम क्षितिजाला टेकले होते.मंदिरातील आणि पाणी प्यायला आलेल्या गोधनाच्या गळ्यातील घंटानादाने वातावरणात पावित्र्य भरत होते.अशा वातावरणात सायंकालीन उपासना केली आणि घाटानजीक असणाऱ्या आश्रमात आसन‌ लावले (विश्रांतीसाठी आपण आपली बैठक पसरतो त्याला परिक्रमेच्या परिभाषेत आसन लावणे असे संबोधतात.)
                        प्रकाश फडके 
                          सांगली
बुधवार दि.३०/४/२५
वैशाख शु.३ अक्षय्य तृतीया 
शके १९४७

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा 
                   भाग ८

     झुंजुमूंजू झाले.आन्हिके व प्रात:उपासना‌ झाली.महाराज चायप्रसादी ले लो कानी पडले.परिक्रमेची परिभाषा किती भावपूर्ण आहे ते चाय या वास्तविक विदेशी पेयापुढे प्रसादी हा शब्द जोडल्याने लक्षात येते.देवाला नैवेद्य दाखविला की त्यामध्ये दैवी कृपाशिर्वाद उतरतात मग ते अन्न,पेय साधारण न रहाता विशेष बनते.त्याच्या सेवनाने शरीर,मन,बुध्दी,चित्त यांची शुध्दी होते.”प्रसादस्तु प्रसन्नता” या उक्तीप्रमाणे आपण प्रसन्नचित्त होतो.
    चायप्रसादी घेऊन प्रसन्नचित्ताने आजचा प्रवास सुरू झाला.कपिलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले.एक मराठी परिक्रमावासी शिवस्तुती गात होते.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी| कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी|
पासून
शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊ नको।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको||
काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टासी शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको||
पर्यंत शिवस्तुती गायन झाले.गाभाऱ्यातील ध्वनींनी उत्कृष्ट वातावरण निर्मिती झाली.भक्तिभावाने केवळ नामस्मरण केल्यास जीवन नौका पार होते ही सनातन श्रध्दा दृढ झाली.
     दुतर्फा केळीच्या बागातून आजची वाटचाल सुरू होती.
केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या
मामा आमचा प्रेमाचा घडावर घड धाडायचा
ही इंदिरा संत यांची बालकविता आठवली. आणि अहो आश्चर्यम्! घडले. एका शेतात केळीचे घड उतरविण्याचे काम सुरू होते. नर्मदे हर! चा पुकारा करून शेतकऱ्याने बोलाविले आणि समोर अख्खा पिकलेला घड ठेवला.केवळ कवितेतील आजोळ आठवताच शेतकरी मामांनी केळी खायला देणे हा मैय्याचा कृपाप्रसादच होय.
    परिक्रमा पथावर भेटणारा प्रत्येक पांथस्थ (नुकतेच बोबडे बोल बोलू लागलेल्या कन्हैया-राधा पासून ते पैलतीराकडे नेत्र लागलेल्या आजी- आजोबांपर्यंत) अत्यंत श्रध्देने नर्मदे हर! हा मंत्र जपत असतो.प्रत्येकाच्या अहंकाराचे हरण करून आनंद देणारी असा या मंत्राचा सर्वमान्य अर्थ आहे.नर्मदे हर! चा जयघोष करून प्रसाद भक्षण करून मार्गस्थ झालो.
    आज मैय्याने बालभोगाचा (आपल्या भाषेत नाष्टा/न्याहरी) वर्षाव चालविला होता.कारण प्रत्येक गावात महाराज बालभोग ले लो म्हणून आग्रह होत होता.परिक्रमा संकेतानुसार विनंतीचा अव्हेर करायचा नसतो.त्यामुळे विनंतीला मान देऊन नर्मदे हर! म्हणून घटकाभर बसणे गरज असल्यास प्रसादी घेणे नसल्यास नम्रतेने नर्मदे हर! म्हणून निरोप घेणे.असा सिलसिला सुरू होता.
     भोजनप्रसादीच्या वेळेपर्यंत बडवानी या शहरात पोहोचलो.श्री सिध्देश्वर सेवा संस्थान संचलित सुसज्ज आश्रम आहे.आजचा प्रसाद जिलेबी,वडा,मिरची भजी,रोटी,भाजी,डाळ,भात असा चौरस होता.मनात विचार येऊ लागला की, मैय्या आज खाण्यापिण्याची एवढी चंगळ का करत आहे? मैय्याच याचे उत्तर योग्यवेळी देईल या समजुतीने विचार दूर केला.नर्मदे हर! म्हणून भोजन पूर्ण केले.
     विश्रांती नंतर आश्रमातील सेवेकरी महंतांचा निरोप घेण्यास गेलो तर ते दोन पत्रकं हातावर ठेवून माहिती सांगू लागले,महाराज! अब कलसे आपको दक्षिणतट की शूलपाणी झाडीसे गुजरना है.यदी आपको झाडीके कठीण रास्तेसे गुजरने में दिक्कत हो तो आप बडा रास्ता जो बावनगजासे शुरू होता है उस रास्तेसे जा सकते हो,और यादी आप शूलपाणी झाडीसे जाना चाहते हो तो जंगल का रास्ता जो बोरखेडीसे सुरू होता है, ले सकतो हो, इन दो परिपत्रमें उसकी सब जानकारी दी गई है.दोनो रास्ते बाद में गोरा कालोनी में मिल जाते है.
       सकाळपासून मैय्या जे खाण्यापिण्याचे लाड करत होती,त्याचे कारण कळले. उद्यापासून आठ ते दहा मुक्काम शूलपाणी झाडीत करावे लागणार होते.लेकराची आबाळ होईल ही काळजी तिला होती.
लेकराचे हित|वाहे माऊलीचे चित्त||
ऐसी कळवळ्याची जाती|करी लाभेविण प्रीती||
पोटी भार वाहे| त्याचे सर्वस्व ही साहे||
तुका म्हणे माझे| तैसे तुम्हा संतां ओझे||
हा तुकोबांचा अभंग आठवत साश्रुनयनांनी पुढे निघालो.
     वयाने ज्येष्ठ होईपर्यंत संसाराचा भार वाहून वाकलेला गृहस्थी उशिरा का होईना काही तप करून इच्छित असेल तर परमेश्वर त्याला सहाय्यभूत होणारच याची प्रचिती आली.
नाम गात,गीता पाठ करत सुर्यास्त समयी गायत्री परिवार ट्रस्ट संचलित पिछोडी या गावातील आश्रमात पोहोचलो.
     उंच डोंगराच्या टोकावर अस्ताला जाणारे सूर्यबिंब विसावले होते.घरट्याच्या ओढीने पक्षांचे थवे वेगाने जात होते,अंधाराची शाल भूमातेवर पांघरून उद्या उगविण्यासाठी सूर्य अस्ताला चालला होता.मावळत्या दिनकराला नमन करून आश्रमात विसावलो.सायंप्रार्थना,उपासना झाली.
       आश्रमात तयार भोजनप्रसादीची सोय नसल्याने आज प्रथमच सदाव्रत घ्यावे लागणार होते.(शिधा घेऊन आपले अन्न आपण शिजवणे याला परिक्रमेच्या परिभाषेत सदाव्रत असे म्हणतात) योग्य तो शिधा घेऊन परिक्रमा वासी एका मातारामच्या (स्री परिक्रमा वासियांना माताराम असे संबोधतात) मदतीने डाळ खिचडी बनवली.आज मैय्याने जसे लाड केले तसेच स्वतःचे काम स्वतः करावे असाही धडा दिला.आजपर्यंत चहाचे आधणही न ठेवणाऱ्याला मैय्याने खिचडी बनवायला लावली.तिच्या कृपेने प्रसादीही चांगली झाली.नर्मदे हरच्या गजरात भोजन झाले.शुलपाणीच्या जंगलात पहिल्या मुक्कामी निद्रावश झालो.
                           प्रकाश फडके
                             सांगली
बुधवार दि.३०/४/२५
वैशाख शु.३ अक्षय्य तृतीया शके १९४७


नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा 
                  भाग ९

     का,कधी,कुठे,कसं,किती,असंच का,इथेच का,आत्ताच का,इतकंच का,माझ्याच बाबतीत का असे अनेक प्रश्न माणसाच्या डोक्याची चाळण करत असतात.काहींची उत्तरे मिळतात तर काही प्रश्न अनुत्तरीत रहातात.सुटलेल्या प्रश्नांची उत्तरेसुध्दा अनेकदा आकलनापलीकडची असतात.काही प्रश्न तर अनुत्तरीत रहातात.
     शूलपाणीच्या जंगलाप्रवासात काही पूर्वसूरींना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी केलेले लिखाण असेच माझ्या आकलनशक्तीच्या पल्याड असल्याने मी त्याला गूढतेच्या चौकटीत बसविले होते.एकदा का एखादी घटना गूढतेच्या चौकटीत बसविली की चिकित्सेला फाटा देऊन चमत्कार रूपी गंध फुलांनी त्याची पूजा करून आपली सुटका करून घेता येते.पण परिक्रमेची साधना सुरू केल्यापासून बुध्दीगम्यते प्रमाणेच भावगम्यताही असते अशा आकलनापर्यंत मी आलो होतो.त्यामुळे बुध्दी ज्याचे उत्तर देऊ शकत नाही त्याठिकाणी भावभावना समजून घेतल्यास उत्तरेही मिळतात आणि प्रश्न पडणे ही कमी होते.असे माझे आकलन झाले होते.
    या बाबतीत ऐतिहासिक उदाहरणात सापाचा चाबूक हातात घेऊन वाघासमवेत चांगदेवांचे ज्ञानेश्वर माऊलींनी भेटण्यासाठी येणे,त्यांच्या स्वागतास माऊलींनी भिंत चालवत घेऊन जाणे आपण ऐकून आहोत.चाळीसगावच्या डॉ.पूर्णपात्रेंचं सोनाली सिंहीणी बरोबरच नातं,प्रकाश आमटेंचे स्नेही असणारे नेगल आणि अन्य वन्यप्राणी ही तर आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणे.त्यामुळे मला जी गोष्ट अशक्यप्राय वाटते ती तशीच असेल असे नाही हे नक्की.
     माझा प्रवास शूलपाणी झाडीतून सुरू आहे माझ्यासारख्या सामान्याला वाटणारे अशा घटनांचे अप्रूप आणि अणिमा,लघिमा,महिमा,गरिमा,प्राप्ती,प्राकाम्य,ईशित्व,वशित्व अशा अष्टमहासिध्दींचे आकर्षण यातून वरील विचारमंथन माझ्या डोक्यात सुरू होते.त्याचबरोबर शूलपाणीच्या जंगलातील भिल्ल आणि आदिवासी परिक्रमावासियांना लुटतात त्यांच्या अंगावर नुसत्या लंगोटी शिवाय काहीही ठेवत नाहीत.असाही अनुभव येतो.
     बध्द ते सिध्द या चार पायऱ्यांपैकी बध्द नामक पायरीवर असणाऱ्या मला ही शूलपाणीची झाडी,त्यातील निसर्ग, वन्यप्राणी आणि मानव काय अनुभव देतात या उत्सुकतेने वाटचाल सुरू होती.
    पिछोडीहून सुरू झालेली वाटचाल मोरकट्टा येथे आली आणि एका आश्रमात भोजनप्रसादीसाठी थांबलो.
तेथील महंत बहुभाषिक होते त्यामुळे मराठीत वार्तालाप सुरू झाला.तरूण वयात संन्यास घेऊन परिक्रमावासियांच्या सेवेसाठी ते येथे राहिले आहेत.भाजी धूणे,चिरणे अशी अर्धकौशल्याची कामे करून त्यांना मदत केली.तो पर्यंत वीस-पंचवीस मूर्ती(परिक्रमा वासियांना मूर्ती हे संबोधन आहे) आल्या होत्या.पहिल्या पंगतीला वाढण्याचे काम केले.रामरस (मीठ),लंका(मिरची) असे परिक्रमेच्या परिभाषेतले दोन नवीन शब्द समजले.
     तेवढ्यात एक आक्रीत घडले.गावातील एक स्त्री व पुरूष असे दोघेजण येऊन हा आश्रम आम्हीच चालवितो वगैरे सांगू लागले. इतक्यात ते भगवी कफनीधारी महंत पण आले.फुकटचे श्रेय घेऊ नका रात्रंदिवस मी इथे राहतोय कोणीही साधी विचारपूसदेखील करत नाही वगैरे प्रतिवाद करू लागले.शब्दाने शब्द वाढत चालला सर्वच मूर्ती स्तब्ध झाल्या.न रहावून एक बुजुर्ग मूर्ती उठली.कोणीच श्रेय घेऊ नका हे सर्व मैय्याच्या कृपेने होते आहे हे विसरू नका. आपसातील वाद आपसात मिटवा. परिक्रमावासी येथे मोफत राहायला खायला मिळते म्हणून येत नसतात तर काही आध्यात्मिक अनुभूती घ्यावी या उद्देशाने येत असतात त्यात तुम्ही विरजण टाकू नका. तुम्ही जी वेळ निवडली आहे ती एकदम चुकीची आहे आपसात बसून वाद मिटवा नर्मदे हर! या त्यांच्या कथनानंतर सर्वत्र शांतता पसरली आणि नर्मदे हरच्या गजरात भोजन प्रसादी सुरू झाली.
     थोडक्यात मतभेद हा माणसाचा स्थायीभाव आहे.स्थळ,काळ,वेळ पवित्र असली तरी कफनीधारीसुध्दा क्रोधाविष्ट होऊ शकतात. 
म्हणोनी आइके अर्जुना|जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना|
मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना|पुरो शके||
या ओवीत माऊलींनी इंधनाला लागलेली एक साधी ठिणगी ते भडकून त्रिभुवन सुध्दा जाळू शकते तद्वत अंत:करणात थोडेजरी जरी विषयांचे स्मरण झाले तरी मोठा अनर्थ ओढवतो असे सांगितले आहे ते पुन्हा या घटनेने अधोरेखित झाले.
      दुपारच्या सत्रात बोरखेडी येथे पोहोचलो.नर्मदा सरोवर प्रकल्पामुळे साठवलेल्या पाण्याच्या फुगवटा किनारी हिरालाल रावत उर्फ हिरा मामा यांच्या कुटीत आसन लावले.गेली अनेक दशके ते परिक्रमावासियांची निस्वार्थ भावाने सेवा करीत आहेत.
किराणा दुकान,छोटी गिरणी असा त्यांचा व्यवसाय आहे.
     ते स्वतः अनेक वर्ष बोरखेडी पंचायतीचे सरपंच राहिले आहेत. नर्मदा सरोवर प्रकल्पामुळे अनेक जण विस्थापित झाले आहेत असेही त्यांनी सांगितले. स्वतः त्यांची मुले इतरत्र नोकरीस असतात. ते आणि त्यांच्या पत्नी येथे राहुन परिक्रमावासीयांची सेवा करतात. बोरखेडी पर्यंत आता पक्का डांबरी रस्ता झालेला असल्यामुळे हा भाग पूर्वी इतका दुर्गम राहिलेला नाही.
     त्यांच्याशी संवाद करताना साहजिकच शूलपाणीच्या जंगलातील लुटमारीचा विषय निघाला. त्यावर त्यांनी सांगितले की ते स्वतः,घोंघसा येथील ब्रह्मलीन लखनगिरी महाराज आणि 
इतर समविचारी सेवाव्रतींच्या प्रयत्नातून आता लुटमार पूर्णपणे थांबली आहे. भिल्ल,आदिवासी यांचे राहणीमान हळूहळू सुधारत आहे. आता ते परिक्रमाासियांना लुटत नाहीत त्याऐवजी वयस्कर परिक्रमावासी ज्यांना स्वतःची पाठपिशवी उचलून चालणे शक्य नाही त्यांना ते योग्य मोबदला घेऊन मदत करतात.
     अर्थात वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण ज्या संस्कृतीत आहे त्या संस्कृतीत असे परिवर्तन होणे अशक्य नाही. 
हिरालाल यांच्या कथनामुळे लुटमारीचा विषय डोक्यातून पूर्णपणे नाहीसा झाला.उद्यापासून शूलपाणीचे प्रत्यक्ष जंगल प्रारंभ होणार आहे.चढ उतार,खाच खळगे,दऱ्याखोरी,पायवाट, ओढे नाले,दगड गोटे,दलदल,चिखल,जंगल,वन्यजीवांचे दर्शन होण्याची शक्यता,विस्मयकारक भौगोलिक रचनांमुळे घडणाऱ्या चमत्कारिक घटना,सावल्यांचे खेळ अशा अनेकविध आव्हानांना उद्यापासून सामोरे जाण्यासाठी आज निद्राधीन झालो.
                           प्रकाश फडके
                             सांगली
शनिवार दि.३/५/२५
वैशाख शु.६ शके १९४७


 नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा 

                  भाग १०
    ‌पहाटे उठलो.स्नान झाले.हिरामामांकडे चायप्रसादी झाली नर्मदे हरच्या गजरात शूलपाणीच्या जंगलमार्गावरील पुढील प्रवास सुरू झाला.उजव्या हाताला नर्मदा मैय्याचा विशाल जलसाठा,डावीकडे उंचच उंच डोंगररांगा अशा नैसर्गिक नजाऱ्यात आगेकूच सुरू झाली.डोंगर माथ्या आडून सूर्यबिंब वर आले.पायवाटा प्रकाशल्या.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश 
हे सुधीर मोघेंचे प्रकाश सूक्त ओठावर आले.
    दमछाक करणारी चढण सुरू झाली.जंगलातील वृक्षाच्छादनामुळे झाडांच्या सावलीतून प्रवास होत होता.मधूनच येणारी हलकिशी वाऱ्याची झुळूक सुखावत होती.झाडांच्या बुध्यांना बांधलेल्या रिबीनी दिशादर्शन करत होत्या.एका मोठ्या दगडावर विसावलो.
     निसर्गाच्या विस्तृत पटलावर नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी पसरले होते. समोरच्या जलाशायातील निष्पर्ण वृक्ष्याच्या बुंध्यावर बगळे विश्रांती घेत होते.काठावरील बगळे वृक्षासनाच्या स्थितीत लबाडीने डोळे मिटून सावजाची वाट पहात होते.बकध्यान हा शब्द का रूढ झाला त्याचे प्रत्यंतर समोर होते.मधेच एखादी प्रवासी बोट ऐलतीरावरून पैलतीरावर जात होती.आकाशात पक्षी स्वच्छंद विहरत होते. जलाशयात वृक्षांच्या सावल्या दिसत होत्या.वाऱ्याने पाण्यावर उठणारे तरंग विस्तारत काठावर येऊन आदळत होते.हे भान हरपून टाकणारे दृश्य निसर्गाशी तादात्म्य होण्यास मदतगार होते.अशा ठिकाणी डोळे मिटून शांत बसण्याचा अनोखा अनुभव घेतला.
     कुली हे गाव आले.३ किमीच्या प्रवासाला दोन तास लागले यावरून चढाचा अंदाज यावा.अशा दुर्गम ठिकाणी आश्रमाचे बांधकाम सुरू होते.ज्या ठिकाणी गरज आहे त्याठिकाणी आश्रमाची सोय करण्याची सेवाभावीवृत्ती दाद देण्यासारखीच आहे.ज्याठिकाणी लूटमार होत होती त्याठिकाणी सेवाभावी वृत्तीचे रोपटे बहरू लागले होते.हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.
     घोंघसा येथील लखनगिरी महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी आता १५ मि.बोटीचा प्रवास करावा लागतो.(सरदार सरोवर धरणामुळे बऱ्याच ठिकाणचा जुना नर्मदा परिक्रमापथ बुडीत क्षेत्रात गेल्याने मार्ग बदलले आहेत.) आश्रमात भोजनप्रसादी झाली.नंतर आश्रम परिसरातील टेकडीवर असणाऱ्या पंचमुखी मारुती मंदिरात गेलो. रामरायांचे भजन करत मारुती मंदिरात बराच वेळ गेला.टेकडीच्या उत्तर मध्य टोकावर उभे राहून आश्रमाकडे पाहिल्यास शंकराच्या पिंडी सारखा आकार दिसतो.आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमुळे मन:शांतीची अनुभूती होत होती.
      एवढ्यात खालून माझे मित्र शिंदे,साने हाका मारू लागले.खाली पोहोचलो तर ते सांगू लागले की आश्रमात राहू देत नाहीत कारण दोन पर्यंत येणारे परिक्रमावासी भोजन करून पुढे जाणे अपेक्षित आहे अन्यथा मागून येणाऱ्या परिक्रमावासियांची सोय होणार नाही त्यामुळे ते पुढे जावा येथे राहू नका असे मागे लागले आहेत.वास्तविक पूर्वनियोजनानुसार लखनगिरी महाराजांच्या आश्रमात एक दिवस राहून येथील सकारात्मक उर्जेने आपण ही उर्जावान व्हावे असा बेत फार पूर्वीपासून ठरविला होता.काय करावे? मैय्याला शरण जावे.ती मार्ग दाखविते.असा विश्वास होताच.
     सेवाव्रतींना सांगितले की,आम्ही येथे एक दिवस मुक्काम करू इच्छितो आपण आश्रमाच्या महंतांना भेटू दिल्यास त्यांना विचारून निर्णय घेता येईल. त्यांनी होकार दिला आणि आम्ही महंतांच्या भेटीस गेलो. त्यांना विनंती केली की परिक्रमा जेव्हापासून मनात आली तेव्हापासून घोंघसा येथे लखनगिरी महाराजांच्या आश्रमात एक दिवस राहावे ही इच्छा आहे. आपण विचार करावा आम्ही कोठेही आसन लावण्यास तयार 
आहोत. दोन-तीन प्रश्न विचारून त्यांनी आमच्या इच्छेची खात्री करून घेतली. राहण्यास परवानगी दिली. मैय्यावर सर्व सोपवून त्याप्रमाणे वागल्यास ती मार्ग दाखवते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
    सायंकाळी महंतांनी आम्हाला बोलावून घेतले. ग्रृहस्थाश्रमातील बऱ्यापैकी सर्व जबाबदाऱ्या आता पार पाडल्या आहेत. पूर्वीच्या काळी या वयात वानप्रस्थाश्रम स्वीकारत होते. आता तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हळूहळू कमी करत जा. तुम्हाला रुचेल ती समाजसेवा करा आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त लक्ष द्या. संसारात राहून अलिप्त राहण्याचा अभ्यास करा. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका. जास्तीत जास्त वेळ सत्संगात घालवा. संतुलित जीवनशैलीचा अंगीकार करा. 
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥ हे सतत स्मरणात ठेवा. परिमित आहार, संतुलित कर्मचेष्टा,तोलून मापून बोलणे,योग्य व्यायाम,वेळेवर व पुरेशी झोप यामुळे शरिरातील सप्तधातू संतुलीत रहातील.
ऐसे युक्तीचेनी हाते|जै इंद्रिया वोपिजे भाते||
तै संतोषासि वाढते|मनचि करी||
म्हणजेच परिमित इंद्रिय तृप्ती झाल्यास मन संतोष वृध्दी करते.
यापुढील पायरी म्हणजे 
बाहेर युक्तीची मुद्रा पडे| तव आत आत सुख वाढे||
तेथे सहजेचि योगु घडे| नाभ्यासिता
.    बाह्य इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करता सहजच योग घडतो.
     असा सत्संग सुरू होता. तुम्ही केव्हाही आश्रमात येऊ शकता येथे तुम्ही चातुर्मास करण्यासाठी या असे त्यांनी आमंत्रण दिले.त्यांची उपासनेची वेळ झाल्याने आम्ही त्यांचा निरोप घेतला.
    ज्या ठिकाणी राहू देण्यास मनाई करत होते त्याच ठिकाणी सत्संगाचा उपहार मिळाला ही मैय्याची कृपाच नव्हे काय?मनोमन मैय्याला नमस्कार केला आणि शूलपाणी जंगलातील मुक्काम सार्थकी लागल्याच्या तृप्तीने झोपी गेलो.
                         प्रकाश फडके 
                          सांगली
शनिवार दि.३/५/२५
वैशाख शु.६ शके १९४७

नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा 
                                           भाग ११

      घोंघसा आश्रमाचा निरोप घेतला.आजही पूर्ण चढाचा रस्ता आहे.चालताना अतिशय काळजीपूर्वक चालावे लागत होते.पाय घसरला तर कपाळमोक्ष निश्चित.नोव्हेंबर महिना असल्याने ओढ्यानाल्यांचे ‌प्रवाह अजुनही दमदार होते.आश्चर्य म्हणजे ज्याला रस्ता म्हणणे अशक्यप्राय आहे त्या पायवाटेवरून,दगडा चिखलातून भिल आदिवासी तरूण निडरपणे मोटरसायकल चालवत होते.
     सूर्य नुकताच वर आला होता.एका वळणावर एक माताराम तीन दगडांची चूल मांडून चायप्रसादी तयार करत होती.हा सेवाभाव पाहून उर भरून आला.आपल्याकडे जे नाही ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक जसे समाजात आहेत तसे आपल्याकडे जे आहे त्या चतकोर,नितकोरात दुसऱ्याला सामील करून घेणारे असे सेवाभावी सुध्दा आहेत.फक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी‌ मेट्रो,टियर १,२,३ सिटीज् अशा धंदेवाईक वर्गीकरणातून बाहेर पडून.शरद जोशींच्या व्याख्येतील भारतात भ्रमण करावे लागेल.चायप्रसादी घेतली,हळूच त्या मैय्या सोबत असणाऱ्या कुमारिकेच्या हातात कृतज्ञता म्हणून काही द्रव्य दिले.मार्गस्थ झालो.
     पुढे एका वळणावर दोन रस्ते फुटत होते.एक डोंगरमाथ्यावर जात होता तर दुसरा दगडगोट्यांनी भरलेल्या ओढा पात्रातून जात होता.संभ्रमातच डोंगरमाथ्याकडील रस्ता पकडला ५-१० मि.चालून वर आलो तर पलिकडच्या डोंगरावर मेंढ्यांच्या कळप दिसला.नर्मदे हर! या मंत्राचा घोष केला.पलिकडून एका मेंढपाळाने प्रतिसाद दिला.तो म्हणाला,महाराज! आप रास्ता भटक गये हो.फिरसे नीचे उतरकर  नालीके रास्तेसे जाओ.नर्मदे हर! म्हणून त्यांचे आभार मानून योग्य रस्त्याला लागलो.
     एक लिटर पाणी संपत आले तरी दूरवर मानवी वस्ती दिसत नव्हती.ऊन्हाचा ताव वाढत चालला होता.वाराही रूसला होता.खेरवानी गावाच्या पुढे पाच आम्रवृक्ष एकाच ठिकाणी आहेत तेथे विश्रांतीसाठी थांबलो.आज बहुतेक परिक्षेचा दिवस असावा.बालभोगही झाला नव्हता.एवढ्यात काही ग्रामस्थ येताना दिसले त्यांनी जवळचा रस्ता दाखवला.महाराज! ये शॉर्टकट है यहासे आप आधे घंटेमें सेमलेट पहूंच जाओगे.मैय्याने बुडत्याला आधार दिला.तोल सांभाळत.पाऊलवाटेने  सेमलेटला पोहोचलो.बालभोगच्या शेवटच्या माझ्या वाट्याच्या राहिलेल्या पोह्याच्या डिशवर ताव मारला.परिक्रमा पथावर चालताना खाण्यापिण्या सारख्या क्षुल्लक गोष्टींची काळजी करू नको.नाम घे! चालत रहा! असा जणु संदेशच मैय्याने दिला.
     एवढ्यात सेवाव्रती म्हणाले,अब यहांसे शामतक आपको कुछ नहीं मिलेगा यहीं रूको दोपहर की भोजनप्रसादी पा के जाना.आप आरामसें भादल पहूंच जाओगे.वेळ होताच नळावर ( ईकडे हॅंडपंपला नळ म्हणतात) कपडे धुऊन घेतले.हातरूमालसुध्दा धुण्याची सवय नसलेल्याने धोतर,बंडी धुऊन घेतले.स्वावलंबनाचा धडा गिरवला.
     भोजन प्रसादी बनवण्यात मदत केली.संवादात समजले की,या प्रदेशात आजही धर्मांतराचे प्रकार घडतात त्याला उत्तर म्हणून येथील गावकऱ्यांनी मंदिर उभारणी केली आहे आणि ते यथाशक्ती परिक्रमावासियांची सेवा करतात.स्वत:कडे धनाची वानवा असतानासुद्धा आमिषांना बळी न पडता धर्मासाठी सेवाव्रत करणारी ही मंडळीच खरी धनवान आहेत याची खात्री पटते‌.
     मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमारेषेवर भादल या एकाच नावाची गावे दोन्हीकडे आहेत.जाताना डांबरी रस्ता व पायवाट असे दोन‌ पर्याय आहेत.पायवाटेचा पर्याय निवडून निघालो.अतिशय तीव्र उताराची पायवाट आहे.काही ठिकाणी अक्षरशः बसून,तर काही ठिकाणी रांगत जावे लागते.महाराष्ट्रातील ता.धडगाव जि.नंदुरबार येथील  भादल गावात पोहोचलो.
     सकला परदेशी यांच्याकडे त्यादिवशी आम्ही सर्व मिळून ३० मूर्ती होतो.पाणवठा जवळपास ५०-६० मी.खाली होता.रोजचे वापराचे व पिण्याचे पाणी या जीवनावश्यक बाबींसाठी किती कष्ट सोसावे लागतात ते समजले.अशा खडतर परिस्थितीत सकलाची आई ,त्याची माहेरपणासाठी आलेली गरोदर बहिण या दोघींनी त्यादिवशी सर्वांसाठी  जात्यावर दळलेल्या मका,नाचणीची भाकरी व उडीद,मुगाचे वरण असा स्वयंपाक सिध्द केला.स्वत:चे रोजचे जीवनसुध्दा अत्यंत कष्टप्रद असताना येणाऱ्या परिक्रमावासियांची निरलस, निस्वार्थी भावाने सेवा करणे ही खरेतर उच्चकोटीची भक्तीचं होय.
     गर्भश्रीमंत तीर्थक्षेत्री जाऊन वातानुकूलित स्पेशल दर्शन रांगेत ताटकळून काही सेकंद मूर्तीदर्शन करून जे पुण्य मी पूर्वी मिळवू पहात होते ते या परिक्रमेत विना खर्च मैय्या कृपेने अशा निरहेतुक प्रेमळ मूर्तींच्या दर्शनाने व  सहवासाने मला मिळत होते हे माझे भाग्यच नव्हे काय?
ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 
खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म|परस्परांच्या सुखाचे वर्म||
समजूनी करील जो त्याग उद्यम|तोचि सेवाभावी समजावा||
.     या सर्व सेवेकऱ्यांना शतश: नमन करून निद्रावश झालो.
                         प्रकाश फडके 
                               सांगली

रविवार दि.४/५/२५
वैशाख शु.७ शके १९४७

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Monday, July 13, 2026

भीमादेवी मंदिर आणि संग्रहालय चंदीगड

 

मुंबई आणि गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आमची चंदीगडहून मुंबईकडे येणारी रेल्वे अचानक रद्द झाली. नवीन गाडीचे आरक्षण मिळेपर्यंत आम्हाला चंदीगडमध्येच अडकून पडावे लागणार होते. अडचण तर होतीच; परंतु या अडचणीनेच आम्हाला चंदीगड आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस मिळवून दिला. आणि अशा वेळी सर्वात आधी आठवण झाली ती कर्नलतपस्वी यांनी सांगितलेल्या पिंजोर गार्डन आणि भीमादेवी मंदिराची! अडकून पडलेल्या सर्वांसाठी एक गाडी भाड्याने केली आणि आम्ही निघालो हरियाणातील पिंजोरच्या दिशेने. प्रसिद्ध पिंजोर अर्थात यादविंद्र गार्डनला अगदी लागूनच, गर्द झाडीच्या शांत परिसरात भीमादेवी मंदिराचे प्राचीन अवशेष आणि संग्रहालय आहे. 

प्रवेश शुल्क प्रत्येकी रु . २ ५ /- 

 येथील संग्रहालयाची मांडणीही आम्हाला विशेष आवडली. विविध शिल्पावशेष एकाच मोठ्या दालनात गर्दीने न ठेवता स्वतंत्र छोट्या दालनांमध्ये मांडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक शिल्प निवांतपणे आणि जवळून पाहता येते.

 आज येथे पूर्ण स्वरूपातील प्राचीन मंदिर उभे नाही. दिसतात ते मंदिराचे भग्नावशेष, दगडी अधिष्ठान आणि परिसरात जतन करून ठेवलेले अनेक शिल्पखंड. पण हे अवशेष पाहताना कल्पना येते की शेकडो वर्षांपूर्वी येथे किती भव्य मंदिरसंकुल उभे असावे! या परिसरातील पुरातत्त्वीय अवशेष साधारण ८व्या ते १२व्या शतकांदरम्यानच्या मंदिरनिर्मितीशी संबंधित मानले जातात. उत्खननात येथे अनेक मंदिरांचे अवशेष आणि शेकडो शिल्पखंड सापडले. मूळ मंदिरसंकुल पंचायतन पद्धतीचे असल्याचे मानले जाते—मध्यभागी मुख्य देवालय आणि त्याच्या चार बाजूंना चार उपमंदिरे, अशी पाच मंदिरांची रचना. आज भग्न अवस्थेत असले तरी मंदिराच्या जोत्याचे अवशेष आणि आजूबाजूला ठेवलेले कोरीव दगड त्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात हे अवशेष पाहताना इतिहासाशी थेट संवाद साधत असल्यासारखे वाटते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

या ठिकाणाचे खरे आकर्षण म्हणजे येथील अप्रतिम शिल्पसंपदा मंदिराच्या भिंती, स्तंभ, द्वारशाखा म्हणजेच दारांच्या कोरीव चौकटी, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली. संग्रहालयात शिव, विष्णू, गणेश, देवीची विविध रूपे, लकुलीश शिव यांसारखी अनेक शिल्प येथे दिसतात . 

 

 

 

 

 

 

 

 

धार्मिक प्रतिमांबरोबरच सुंदर स्त्रीप्रतिमा आणि अलंकारिक शिल्पे पाहायला मिळतात. . स्त्रीदेहाची सहज, लयबद्ध मुद्रा दगडात इतक्या सुंदर रीतीने साकारलेली पाहून त्या काळातील शिल्पकारांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

 मिपाकर प्रचेतस यांनी एका प्रतिसादात म्हटले आहे की या संकुलातील छायाचित्रे अजून हवी होती . 

@प्रचेतस , हि घ्या तुमच्या आवडीची दर्पणा ! सोबत आलस्या 

 

 

 

स्तंभ, द्वारशाखा, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली.

 

 

जाता जाता कर्नलतपस्वींनी सुचवल्यामुळेच हे हे मंदिर पाहता आले तेव्हा त्यांच्या आवडीच्या छंदाची येथे घेतलेली दोन छायाचित्रे . 

 

खरं तर या ठिकाणी येण्याचे आमचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. आमची रेल्वे वेळेवर सुटली असती, तर कदाचित आम्ही या मंदिरापासून अगदी जवळ असूनही ते न पाहताच मुंबईला परतलो असतो. पण गाडी रद्द झाली, आम्ही चंदीगडमध्ये अडकलो आणि त्यामुळेच हे प्राचीन मंदिरसंकुल पाहण्याची संधी मिळाली. गर्द झाडीच्या सान्निध्यात शांतपणे उभे असलेले मंदिराचे भग्नावशेष, दगडात गोठलेली शेकडो वर्षांपूर्वीची कला आणि संग्रहालयात जपून ठेवलेली त्या काळातील शिल्पसंपदा पाहताना एकच विचार मनात आला— काही भेटी आपण ठरवतो... आणि काही भेटी नियती आपल्यासाठी ठरवून ठेवते!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Monday, July 6, 2026

alibagonline.com

https://alibagonline.com/mr/welcome-to-alibag/

अथांग समुद्राची साथ लाभलेले, निसर्ग रम्य आधुनिक टुमदार शहर

भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे व अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणारे ठिकाण. हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक राजवटींनी राज्य केलेले, त्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जतन करून आधुनिकतेशी सांगड घालणारे अलिबाग. नारळी पोफळीच्या हिरव्यागार झाडीने भरलेले व अस्सल कोकणी परंपरा जपलेले. अनेक ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे, सुंदर समुद्रकिनारे, व जोडीला अस्सल कोकणी, चवदार खाद्यपदार्थ यामुळे अगदी दूरपर्यंत पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले निसर्ग रम्य, अलिबाग.

या आपल्या अलिबागमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले व इतर वास्तू, पुरातन मंदिरे, व अनेक निसर्गरम्य परिसर, येथील संस्कृती, परंपरा, उत्सव, निसर्ग विविधता, या आणि अशा अनेक गोष्टीच्या अभ्यास करून, प्रत्यक्ष भेट देऊन, अनेक संदर्भ , माहिती आणि चित्रांचा प्रचंड साठा संकलन करून सज्ज झालेले हे अलिबागचे वैशिष्ट्यपुर्ण पोर्टल “AlibagOnline® “. आमचा प्रत्येक लेख आपल्याला माहिती, संदर्भ आणि इमेजेस देण्यासाठी काळजीपूर्वक तयार केला आहे. अलिबागचे रहिवासी तसेच अलिबागला भेट देणारे सर्व पर्यटक व अलिबागप्रेमी यांना अलिबागची खरी ओळख करून देण्यासाठी हे पोर्टल नक्कीच मदत करेल.

https://alibagonline.com/mr/welcome-to-alibag/



















































































Friday, July 3, 2026

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012

  2010 साली आमच्या शेजारचे वैष्णोदेवी यात्रेसाठी चालले होते तेव्हा माझ्या मनातही आले कि आपणही जावे पण त्यावर्षी काही कारणांमुळे नाही जाता आले. घरातील देवीसमोर नेहमी हात जोडुन प्रार्थना करायचे की माता राणी आम्हाला ही बोलव तुझ्या दर्शनाला. शेवटी 2012 साली हा योग जुळुन आला. जानेवारी 2012 मधे आमच्या बाबांच्या ओळ्खीचे एक काका आमच्या घरी आले होते तेव्हा बोलता बोलता त्यांनी विचारले की अमरनाथ यात्रेला येणार का? हे काका दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात आणी ह्या वेळेला ते 7 व्यांदा जात होते. ह्या वर्षी ते अमरनाथ-वैष्णोदेवी-अम्रुतसर जाणार होते. घरी आम्ही सर्वांनी विचार करुन मग मी , माझी बहीण आणि आई अस आमच 3 जणांच जाण ठरल. 22 जुन ते 31 जुन अशी 10 दिवसांची सहल होती. तयारी व प्रस्थान अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रुप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते. (माहिती जालावरुन साभार) गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात. दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे. अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी आपल्याला आधी जम्मु काश्मीर बॆक मधुन फॊर्म आणुन आपली नोंद्णी करावी लागते व त्यासोबत डॊक्टरांचा आपण या यात्रेसाठी फिट असल्याचा दाखला ही जोडावा लागतो. आम्ही हे सर्व देउन आलो व आम्हाला दर्शन करण्यासाठी 25 जुनची तारीख त्यांनी दिली. 25 जुन सोमवार असल्यामुळे आम्ही ही खुश झालो. नोंद्णी झाल्यावर मग त्या काकांनीच रेल्वे बुकिंग, राह्ण्याची सोय या सर्वांची व्यवस्था केली. आम्ही बालताल (13 कि.मी) मार्गे जाणार होतो. एवढा लांबीचा ट्रेक आम्ही कधी केला नव्ह्ता. त्या काकांनी आम्हाला सांगितल तुम्ही रोज थोडे शुज घालुन चालण्याचा सराव करा. त्याप्रमाणे आम्ही जुहु चौपाटी वर रोज सकाळी चालण्याचा सराव करण्यासाठी जाउ लागलो. हळुहळु दिवस सरत होते व सोबत आमची तयारी ही सुरु होती. जम्मु काश्मीर मधे थंडी खुप असल्याने आम्हाला थर्मल घ्यावे लागले. शुज आम्ही बालताल ला जाउन घेतले तिथे स्वस्त आणि मस्त मिळ्तील अस आम्हाला काकांनी सांगितल होत आणि ते खरेच ठरले ते शुज माझ्याजवळ अजुन हि आहेत. लहान-मोठ्या अशा सर्व सामानाची खरेदी करुन आम्ही एकदाच्या बॆगा भरुन ठेवल्या. शेवटी 21 जुन उजाड्ला. उद्या निघायचे होते. रेल्वे प्रवासात खाण्यासाठी आई सर्व पदार्थांची तयारी करत होती. नंतर आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या शिवमंदीरात गेलो व तिथे शिवशंभोला आमचा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना केली. 22 जुनला सकाळी 7.55 ची आमची स्वराज एक्स्प्रेस ही गाडी होती. आम्ही 7.15 पर्यंत वांद्रे टर्मीनसला पोहोचलो. काकांनी आमची सर्व इतर प्रवाशांसी ओळख करुन दिली. आम्ही एकुण 22 जण होतो या यात्रेसाठी. गाडीची वेळ झाली आणी आम्ही आमच्या जागेवर जाउन बसलो. गाडीमधे 70% प्रवासी तरी अमरनाथ ला जाणारेच होते. बम बम भोले च्या गजरात गाडीने वांद्रे टर्मीनस वरुन प्रस्थान केले. क्रमश:



22 जुन 2012 गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो. 23 जुन 2012 काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी. आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते. आम्हाला वाटले आता एखाद्या हॊटेलमधे जाऊ ,आराम करु आणी उद्या सकाळी बालताल साठी निघु. पण स्टेशन वरुन बाहेर येताच काकांनी सांगितल की आता आपली बस येईल व आपण बालताल साठी निघणार आहोत. आमचा तेव्हा मुड ऒफ झाला थोडा कारण 30 तासांच्या प्रवासाने आम्ही आधीच दमलो होतो. दोन दिवस आंघोळ केली नव्ह्ती व आता अजुन 10-12 तासांचा प्रवास आम्हाला बसने करायचा होता. पण आम्हाला 25 जुन ची तारीख दर्शनासाठी दिलेली होती त्यामुळे आम्हाला आज निघावच लागणार होते. 5 वाजता आमची बस आली व आम्ही बालतालच्या दिशेने निघालो. जम्मु ते बालताल अंतर 400 कि.मी आहे ते पार करण्यासाठी बसने 10 ते 12 तास लागतात. जसजसे आम्ही जम्मुपासुन पुढे जाऊ लागलो वातावरण बदलु लागले. हवेमधे गारवा वाढु लागला. रात्री 9-10 च्या सुमारास आम्ही एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो. इतका वेळ आम्ही बंद खिड्क्यांच्या बसमधे होतो त्यामुळे आम्हाला बाहेरच्या थंडीचा अंदाज आला नाही. आम्ही असेच स्वेटर न घालता बसमधुन उतरलो. जसे उतरलो त्याच्या दुप्पट वेगाने पुन्हा बस मधे शिरलो. बाहेर खुप थंडी होती. आम्ही शाल,स्वेटर,कानटोपी, हातमोजे असा सर्व लवाजमा अंगावर चढवुन मग उतरलो. अमरनाथ यात्रेकरुंसाठी जागोजागी भंडारे असतात जेथे आपण मोफत स्वादिष्ट जेवणाचा लाभ घेऊ शकता. बालताल इथेही सर्व भंडारे असतात. जास्तीत जास्त भंडारे हे पंजाबमधील असतात. हे लोक 15 कोटीहुन ही जास्त खर्च करुन शिवभक्तांची सेवा करतात. आपण जाताच हे लोक भोले भोले म्हणुन आपले स्वागत करतात. विविध भाज्या , भातांचे विभिन्न प्रकार, मिठाया , चहा , कॊफी, गरम दुध अशा सर्व पदार्थांची रेलचेल असते. हे लोक आपल्याला राह्ण्यासाठी खोल्या ही देतात. आपण आपल्या इच्छेनुसार त्यांना पैसे देउ शकतो. भंडारामधे जेवण करुन आम्ही पुढे निघालो. 24 जुन 2012 जम्मु-उधमपुर-कुद-पट्नीटॊप-रामबाण-बनिहाल-अनंतनाग-श्रीनगर असे करत आम्ही सकाळी 7 च्या सुमारास सोनमर्ग ला पोहोचलो. गाड्यांची मोठी रांग लागली होती.कारण पुढे गेट लागला होता. सतत होणा-या दह्शतवादी कारवायांमुळे सर्व गाड्यांची कसुन तपासणी करण्यात येत होती.आमच्या गाडीचा नंबर यायला वेळ लागणार होता. मग तोपर्यंत आम्ही बसमधुन उतरुन जवळच असलेल्या हॊटेलात जाउन जरा ब्रश वगैरे करुन चहा-नाश्ता केला व जरा आसपास फिरलो. शेवटी एक तासाने गेट उघडले व आम्ही मार्गस्थ झालो. 9 वाजता आम्ही बालताल इथे पोहोचलो. इथे आपल्याला खुप सिक्युरिटी चेकींग मधुन जावे लागते. आपण सर्वांनी बस मधुन उतरायच. बसची सामानासकट चेकींग होते. महीला व पुरुषांसाठी वेगवेगळे चेकींग बुथ असतात तेथे आपण आपला दर्शनासाठी असलेला पास घेउन जायच. शेवटी सर्व सोप्स्कार आटपुन आम्ही बालताल येथे प्रवेश केला. आमची बस पार्किंग मधे निघुन गेली. आम्ही 2 दिवसांसाठी लागणार सामान सोबत घेतल होत बाकी सामान बसमधेच ठेवल होत. ज्या काकांसोबत आम्ही आलो होतो ते पंजाब येथील मलोट गावचे होते आणि त्यांचा हि इथे दरवर्षी भंडारा असतो. आम्ही तिथेच 2 दिवस राहणार होतो. आम्ही गेल्या गेल्या त्यांनी भोले भोले म्ह्णत आमचे स्वागत केले व आम्हाला चहा- नाश्ता आणुन दिला. बम बम भोले..! क्रमश:


अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3 24 जुन 2012 चहा -नाश्ता करुन आम्ही आंघोळीला गेलो. त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी दिले होते पण थंडी इतकी जास्त होती कि पाणी लगेच गार होत होते. आम्ही आंघोळीला गेलो त्याच वेळेला जोरदार पाउस सुरु झाला. अगोदरंच थंडी त्यात पाउस. आम्हाला नीट आंघोळ करताच आली नाही. कसेतरी दोन तांबे अंगावर घेतले आणि आलो बाहेर. आंघोळ उरकुन जेउन आम्ही बालताल फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. बालताल हे अमरनाथ यात्रेसाठी मुख्य तळ आहे. सोनमर्गजवळ सिंध नदीच्या काठी सुंदर बालताल खोरे वसलेले आहे.त्याची समुद्र्सपाटी पासुन उंची 2743 मीटर आहे.सिंधच्या पाण्यामुळे, विखुरलेल्या हिरवाईने आणि बर्फाच्छ्दित पर्वतंरागांमुळे , ही दरी निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानली जाते.बालतालच्या अस्थिर प्रदेश आणि निर्जन जागेमुळे त्याला वारंवार ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साइट बनविण्यात हातभार लागला आहे. बालताल व्हॅलीचा नयनरम्य परिसर फोटोग्राफरमध्येही लोकप्रिय आहे वर्षंभर इथे वातावरण सुखद असते. (बालताल छावणी येथील काही दृष्य)













बालतालमध्ये ठिकठिकाणी भंडारे लागले होते. आपण कोणत्याही भंडारामध्ये जाउन जेवु शकतो. (आम्ही थांबलेलो तो भंडारा)

आम्ही आधी बुट घेउन आलो जे आम्हाला फक्त 150 रुपयात मिळाले. जागोजागी सैनिकांचा पहारा होता. आपले सैनिक तिथे डोळ्यात तेल घालुन आपली यात्रा सुरक्षित व्हावी म्हणुन पहारा देत होते हे पाहुन मन भरुन आले. आम्ही तेथील एका सैनिकासोबत फोटो काढण्याची इच्छा प्रकट केली, ते आधी नाही म्हणु लागले. मग तो फोटो सोशल मिडीयावर कुठेही टाकणार नाही अस आम्ही त्यांना सांगितल्यावर ते तयार झाले. थोड इकडेतिकडे फिरुन आम्ही आमच्या रुमवर आलो. निघायची सर्व तयारी करुन आम्ही 9 वाजताच जेवुन झोपुन गेलो. (भंडा-यामधे जेवताना) 



25 जुन 2012 रात्री 2 वाजता आम्ही उठलो. सकाळी 7-8 वाजता निघण्यापेक्षा आम्ही रात्री 3 वाजता निघणार होतो. त्यामुळे गर्दीही कमी मिळाली असती व आम्ही लवकर दर्शन घेउन आलो असतो. उठुन प्रात:विधी आटपुन आम्ही तयारीला लागलो. हाडे गोठवणारी थंडी होती त्यामुळे आम्ही आधी आपली अंर्तवस्त्रे मग त्यावर थर्मल , टी-शर्ट, स्वेटर , जाकीट व त्यावर रेनकोट, हातात हातमोजे, कानात कापुस , मग कानटोपी , जाड मोजे आणि बुट अशी जय्यत तयारी करुन बाहेर पडलो. चहा नाश्ता करुन आम्ही निघालो. आमच्या भंडाराच्या बाहेरच घोडेवाले,पालखीवाले , सामान नेण्यासाठी पिठ्ठु जमले होते, ज्यांना घोडे किंवा पालखीने जायचे असल्यास इथुनच ठरवुन जावे लागते. आम्ही पायी जाणार होतो, म्हणुन पुढे निघालो. जिथपर्यंत भंडारे होते तिथपर्यंत दिव्यांचा उजेड सोबत होता, मग अंधार सुरु झाला. विजेरीच्या उजेडावर बम बम भोले करत आम्ही निघालो. बालताल मार्ग खालील प्रमाणे बालताल - दोमेल - (2 किमी) दोमेल ते बराडी - ( 5 किमी) बराडी ते संगम - (4 किमी) संगम ते पवित्र गुफा - (3 किमी) (यात्रेचा मार्ग) 

 



पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला होता. आम्ही हळुहळु चालत होतो. दोमेल पार झाल्यानंतर उजडायला सुरुवात झाली. निसर्गाने त्याच रुपड दाखवायला सुरुवात केली. सगळीकडे धुके पसरले होते. सतत पाऊस सुरु होता त्यामुळे थंडीही वाढली होती, रस्ता निसरडा झाला होता. हा रस्ता खुप लहान आहे. एका बाजुला डोंगर आणि एका बाजुला दरी. जेमतेम 4 माणस एकत्र चालु शकतील एवढाच रस्ता आहे आणि यातुनच घोडेवाले हि ये-जा करतात. जरा दुर्लंक्ष केल तर आपण खाली दरीत पडु शकतो. (पावसाने चिखलमय झालेला रस्ता) 



(यात्रेचा मार्ग)





दोमेलपासुन पुढे कठीण चढाई सुरु होते. दोमेलपासुन बराडीपर्यंत यात्रेकरुंसाठी कोठेही थांबण्यासाठी जागा नाही. हि चढाई करता करता आम्ही दमलो. मुखाने बम बम भोले करत आम्ही चाललो होतो. जे लोक दर्शन करुन येत होते ते आम्हाला बस अजुन थोडच दुर आहे म्हणुन दिलासा देत होते. बराडीपर्यंत पोहचेस्तोवर आमची हालत खराब झाली होती. आम्ही हातात लोकरीचे मोजे घातले होते आणी ते पावसांमध्ये पूर्ण भिजले. थंडी इतकी होती कि आमचे हात सुन्न झाले होते. बराडी पोहचल्यावर एका लहानश्या टपरीवर चहा घेतला, थोड बर वाटल. पुन्हा चालायला सुरुवात केली. (चहा घेण्यासाठी थांबलेलो आम्ही, सर्वात शेवटी मी)

(बराडी ते संगम मार्गावरील एक ठिकाण)

(यात्रेत दिसलेले मनमोहक शिखर)

अजुन संगम यायच बाकी होत. हळुहळु पाय उचलत चालत होतो. एकदाचे संगम आले. (संगम - उजवीकड्चा रस्ता पहलगाव वरुन येणारा व डावीकडचा बालतालहुन)

पहलगाम आणी बालताल इथुन येणा-या दोन्ही रस्त्यांचा संगम इथे होतो. इथे पोहोचल्यावर आपल्याला पवित्र गुफा दिसु लागते.

(पवित्र गुफेकडे जाणारा मार्ग)

(संगमहुन गुफेकडे जाणारा मार्ग) 



पण अजुनही बाबा बर्फानी आणी आपल्यात 3 कि.मी चे अंतर आहे. संगमवरुन पुढे चालायला लागल्यावर डावीकडे कातळामधे कालीमाता आपल्याला दिसते. 

आता पुढील मार्ग हा पूर्ण ग्लेशियर वरुन जायचा होता. त्या ग्लेशियरच्या आधी एक भंडारा होता तेथे आम्ही जेवणासाठी थांबलो. पराठा भाजी खायला होत. पण जसे आम्ही जेवणासाठी हातमोजे काढले तेव्हा समजल हाताची बोटे पूर्ण सुन्न झाली होती. मी आणी बहीणीने अक्षरक्ष: तिथे रडायला सुरुवात केली. रात्री 2 पासुन आम्ही चालत होतो, निट खाणेही झाले नव्ह्ते. आता खायला होते तर आम्हाला तो पराठा बोटाने तोडता हि येत नव्ह्ता. शेवटी आमच्या आईने आम्हाला भरवल. कसतरी थोड खाउन व चहा घेउन आम्ही निघालो.ग्लेशियर वरुन जाताना सारखे पाय घसरत होते. (ग्लेशियरवरुन जाताना आम्ही व समोर पवित्र अमरनाथ गुफा) 

(ग्लेशियरवर तात्पुरती निवासासाठी बांधलेले तंबु) 



माझ्यामधे काहीच शक्ती उरली नव्हती. उंचावर विरळ हवेचा त्रास जाणवु लागला होता. मग मी गुफेपर्यंत जाण्यासाठी डोली केली. डोली म्हणजे एका खुर्चीला 2 बांबु आडवे लावलेले असतात. आपण त्या खुर्चीत बसायच मग 4 माणसे ती खुर्ची बांबुंच्या साहाय्याने उचलुन घेतात. (डोली - चित्र जालावरुन साभार) 

 



त्यांनी मला गुफेजवळ आणुन सोडल. मी इतर लोक येण्याची वाट पहात तिथेच बसले. थोड्या वेळाने सर्वजण आले. मग आम्ही तिथेच असलेल्या एका दुकानात आमचे सर्व सामान , बुट,कॅमेरा काढुन ठेवले. गुफेमधे हे सर्व नाही नेउ शकत. आम्ही बुट काढुन मोज्यांवर प्लास्टिकची पिशवी लावली. गुफेच्या आत सर्वत्र थंड पाणी असते म्हणुन ही काळजी घ्यायची. आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. गुफेबाहेर रांग होती . ओळीने एकेकाला आत सोडत होते. आमचा नंबर आला आणी समोर दिसले बाबा बर्फानी. तो क्षण आता मी इथे सांगु ही शकत नाही काय वाटले त्या वेळेला (तुझे रूप पाहता देवा,झाले सुख झाले माझ्या जीवा) सोमवार , 25 जुन 2012 दु. 2.30 मि. ला आमचे दर्शन झाले. यात्रा सुरु केल्यानंतर 12 तासांनी. बाबा बर्फानींचे दर्शन होताच सर्व थकवा निघुन गेला. डोळ्यातुन अश्रू वाहु लागले आणी मुखातुन बम बम भोले गाऊ लागलो. (पवित्र अमरनाथ गुफा)

(गुफेतील बाबा बर्फानी - चित्र जालावरुन साभार) 



जवळच दोन बर्फाचे आकार आहेत ते पार्वती माता व श्रीगणेश आहेत अशी मान्यता आहे. त्यांचेही दर्शन केले. आम्हाला प्रसादामधे चांदीचे बेलपत्र मिळाले. बाहेर आल्यावर हे शिवलिंग वितळुन जे पाणी तयार होत ते नळाच्या साहाय्याने बाहेर आणलेल आहे. आम्ही तिथुन ते पवित्र जल एका बाटलीमधे भरुन घेतल. पुन्हा एकदा गुफेकडुन पाहुन हात जोड्ले. भोले बाबांकडे प्रार्थना केली की आम्हाला पुन्हा तुझ्या दर्शनाला बोलव व आमचा या पुढील प्रवास सुखकर होवो. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. गुफेच्या आसपास वातावरण खुप थंड झाल होत. पुन्हा बालतालपर्यंत चालत जाण्याची आमच्यात शक्ती नव्ह्ती मग आम्ही घोडे केले खाली जाण्यासाठी. दु. 3.30 ला आम्ही निघालो ते रात्री 9 वाजता आम्ही 5 तासाने आमच्या भंडाराजवळ आलो. (परतीच्या मार्गावर असताना)

या 5 तासात आम्ही एकदाही घोड्यावरुन खाली उतरलो नाही आणी जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही एकही पाऊल पुढे टाकु शकत नव्हतो. कंबरेखालील पुर्ण शरीर बधीर झाले होते. अक्षरक्ष: आम्ही स्वत:ला घसपटत आमच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो. जाताच कसेतरी बुट काढुन आम्ही सरळ बिछान्यावर पडलो. 2-3 तासाने आमचे बाकीचे सहकारी आले तेव्हा त्यांनी उठवल्यावर आम्ही जेवायला गेलो. जेऊन येऊन पुन्हा झोपलो. पाय खुपच दुखत होते. मी जिथे झोपले होते तिथे माझ्या बाजुला एक दुस-या गटातील काकी होत्या, ते लोक उद्या दर्शनासाठी जाणार होते. त्यांनी माझी अवस्था पाहीली व स्वत:कडे असलेल्या तेलाने माझ्या हातापायांची मालिश करुन दिली. मी त्यांना ओळखत ही नव्ह्ते तरी त्यांनी माझ्यासाठी एवढ केल जणु भोले बाबांनीच तिला माझ्यासाठी पाठवल होत. अमरनाथ यात्रेला येणा-या प्रत्येकाला इथे भोले म्हणुन संबोधल जात. आम्ही सर्वच भोले होतो, इतर कोणत्याही ओळखीची तिथे आवश्यकता नव्हती. कधी निद्रेच्या अधीन झाले समजल हि नाही. उद्या आम्ही बालताल वरुन निघणार होतो जम्मुला जाण्यासाठी. माझ्या माताराणीचे दर्शन करण्यासाठी. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।। क्रमशः



26 जुन 2012 आज सकाळी आरामात 8 वाजता उठलो. आश्चर्याची गोष्ट अशी की अंग जराही दुखत नव्हते. रात्री आम्ही एवढे थकलेलो होतो की वाटल उद्या काही खर नाही आपल पण आम्ही सर्वजण एकदम ठिक होतो. चहा-नाश्ता करुन आम्ही 10 वाजता जम्मु कटराकडे प्रस्थान केले. काश्मीरमधे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. मुघल बादशहा जहांगीरने फारसी भाषेत म्हटले होते, ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’म्हणजे पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर ते इथे आहे, ते येथे आहे आणि फक्त येथे आहे.याची प्रचीती आम्हाला पावलोपावली येत होती.बसच्या खिडकीतुन जिथपर्यंत नजर जात होती एकापेक्षा एक सुंदर नजारे दिसत होते. इथल्या सुंदर टेकड्या, उंच डोंगररांगा यांदरम्यान वाहणा-या नद्या व झरे, झुडूपांनी भरलेले जंगल, फुलांनी वेढलेल्या पायवाटा,जणू आपण एखाद्या स्वप्नातील जागेत आहोत असे आपल्याला भासते. भारताच्या नकाशामध्ये जम्मु-काश्मीर हा मुकुटाप्रमाणे आहे जो प्रत्येक हंगामात आपला रंग बदलतो. प्रवासात टिपलेले काही क्षण







अडीच तासांनी आम्ही श्रीनगर मधे पोहोचलो डल सरोवराच्या किनारी. आम्ही येथे मुघल गार्डन पाहण्यासाठी व डलमधे बोटिंग करण्यासाठी थांबलो. श्रीनगर जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी आहे. श्रीनगरमध्ये त्यांच्यावर तरंगणारी सुंदर सरोवरे आणि हाउसबोट्स पाहणे मनमोहक आहे. सुकामेवा आणि पारंपारिक काश्मिरी हस्तकला इथली काही प्रमुख आकर्षणे आहेत.डल सरोवर आणि नागिन सरोवर येथील प्रसिद्ध सरोवरे आहेत. श्रीनगरमधील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे डल सरोवर. श्रीधारा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या सरोवरातील चमकणारे पाणी हे पाहण्यासारखे आहे.





श्रीनगरमधे दिसणारी शिकारा म्हणजे डल सरोवराचे सर्वाधिक आकर्षण.सांस्कृतिक प्रतीक म्हणून मान्यता प्राप्त,शिकारा ही एक नाव आहे. सरोवराचा आनंद लुटण्यासाठी, आपण शिकारा (वेनिसमधील गोंडोलासारखी दिसणारी अरुंद लाकडी नौका) नावेंमध्ये फिरायला जाउ शकतो.शिकाराचा उपयोग स्थानिक रहिवासी वाहतुकीसाठी करतात. शिकारामार्गे सरोवराच्या एका टोकापासून दुस-या बाजूला वस्तूंची वाहतूक केली जाते. येथील सरोवरातील बाजारपेठ खरेदीसाठी मुख्य आकर्षण आहे आणि तलावाच्या मध्यभागी बरीच दुकाने आहेत. हाताने तयार केलेले कानातले, लाकडी कलाकृती आणि केशर येथे मिळतात. आपण काश्मीरी वेषभुषा करुन शिकारामधे आपले फोटोही काढु शकतो.







डल सरोवराचे दुसरे आकर्षण म्हणजे हाउसबोट. हाउसबोट या स्थिर बोटी आहेत. जे सरोवराला भेट देणा-या पर्यटकांसाठी निवास म्हणून वापरल्या जातात.डल सरोवरावर हाऊस बोट ही संकल्पना ही ब्रिटीशांची होती, ज्याने पर्यटनाला चालना दिली.हाऊसबोट्स डल सरोवराचे विहंगम दृश्य तसेच सरोवराजवळील पर्वतांचे विहंगम दृश्य दर्शवितात. पर्यटन विभागाने वर्गीकृत केलेले हे हाऊसबोट्स एका साध्या खोलीच्या प्रकरणांपासून ते प्रशस्त लक्झरी स्वीट्सपर्यंतचे असू शकतात. त्यांचे आतील भाग काश्मिरी क्रिस्टल झूमर, कार्पेट्स आणि फर्निचरसह सुंदर सजावट केलेले असतात.हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे.



हाउसबोटमधे राह्ण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता तर आम्ही शिकारा बोटीतुन डल सरोवरात फ़ेरफ़टका मारुन आलो. (शिकारातुन सफारी)

शिकारातुन फिरुन आल्यावर आम्ही डल सरोवराजवळ असलेल्या निशांत गार्डनमधे गेलो. मुघल राजवटीत, मोघलांनी फारसी वास्तुकलेमध्ये ब-याच प्रकारच्या बागांची निर्मिती करण्यास सुरवात केली आणि या बागांच्या संयोजनाला मुघल गार्डन असे म्हणतात.श्रीनगरमधील मुघल गार्डनमध्ये निशांत बाग, शालीमार बाग, चश्मे शाही, परी महल, अचबल आणि वेरीनाग गार्डनचा समावेश आहे. निशांत बाग डल सरोवरच्या काठावर वसलेले आहे. जबरवान पर्वत त्याच्या पार्श्वभूमीवर आहे.नूरजहांचा मोठा भाऊ आसिफ खान यांनी 1633 मध्ये बागेची रचना केली.निशात बाग म्हणजे आनंदाची बाग. या बागेत दुर्मिळ प्रजातीची फुलझाडे, चिनार वृक्ष आणि सरुची झाडे देखील आढळतात. हा मुघल गार्डन, या प्रकारातील सर्वात मोठा टेरेस गार्डन आहे. येथे स्थित सुंदर झरे, मोठे लॉन आणि सुंदर फुलांमुळे ही बाग बरीच प्रसिद्ध आहे. येथील सर्वच बागा खुप सुंदर आहेत, आम्ही फक्त हिच पाहीली. खरच अशी बाग मी याआधी पाहिलीच नव्ह्ती. फुलांची इतकी विविधता तेथे होती. तुम्ही खाली दिलेल्या चित्रांमधे पाहु शकता. भरपुर फोटोग्राफी करुन आम्ही बागेतुन बाहेर आलो. येताना आम्ही काही फुलांच्या बिया घेतल्या घरी येउन लावण्यासाठी पण काय माहीत इथे मुंबईला आणुन लावल्यावर त्यातुन रोप आलेच नाही, असो.



(जबरवान पर्वत)













बाहेर येउन डलच्या किनारी आम्ही फालुदा खाल्ला व पुढे मार्गस्थ झालो. डल सरोवर आणि बागेत फिरुन येईपर्यंत आम्हाला 4 वाजले होते. रात्री 9 च्या सुमारास एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो. रोटी, डाल फ्राय, आलु-गोभी ची भाजी, जिरा राइस अशा मस्त गरमा गरम जेवणावर ताव मारला. उत्तर भारतात आपल्याला सर्व ठिकाणी असेच जेवण मिळ्ते. जेऊन निघालो ते मग थेट कुठेही न थांबता रात्री 1 वाजता आम्ही कटराला पोहोचलो. हॉटेलवर चेक-इन केल. रुमवर जाताच हात-पाय धुऊन सरळ ताणुन दिली. खुप प्रवास झाला होता आज. 27 जुन 2012 आज आम्ही आरामात 11 वाजता उठलो. आम्ही दुपारी 3 वाजता वैष्णोदेवी ट्रेक करणार होतो. कटरा हे जम्मू-काश्मीर राज्यातील त्रिकुटा पर्वतच्या पायथ्याशी असलेल्या रियासी जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. वैष्णो देवीला भेट देणा-या यात्रेकरूंसाठी कटरा बेस कॅम्प म्हणून ओळखले जाते.येथे भरपूर हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, ढाबे, फास्ट-फूड जॉइंट्स उपलब्ध आहेत जे सर्व प्रकारच्या बजेटमध्ये फिट आहेत. दरवर्षी लाखो भाविक या तीर्थस्थळी भेट देतात. वैष्णोदेवी मंदिराबद्द्ल.. वैष्णो देवी मंदिर, हिंदू मान्यतेनुसार शक्तीला समर्पित असे सर्वात पवित्र हिंदू मंदिर आहे , जे जम्मू आणि काश्मीर, राज्यातील त्रिकुट पर्वतावर वसलेले आहे. हे उत्तर भारतातील एक अत्यंत पवित्र स्थान आहे. या धार्मिक स्थळाची आराध्य देवी, वैष्णो देवी यांना सामान्यत: माता राणी आणि वैष्णवी म्हणूनही ओळखले जाते. माता वैष्णो देवीबद्दल अनेक कथा आहेत. एका प्रसिद्ध प्राचीन श्रद्धेनुसार, माता वैष्णो यांचे परम भक्त श्रीधर यांच्या भक्तीमुळे माता प्रसन्न झाली,आणि जगासमोर आपल्या अस्तित्वाचा पुरावा दिला. हि कथा खालीलप्रमाणे आहे. श्रीधर पंडित माता वैष्णो देवीचे उत्कट भक्त होते. ते सध्याच्या कटरा शहरापासून 2 किमी अंतरावर हंसली गावात राहत होते.एकदा माता वैष्णोने त्याला एका मोहक लहान मुलीच्या रुपात दर्शन दिले व श्रीधर पंडितला 'भंडारा' (भिक्षू आणि भक्तांसाठी मेजवानी) आयोजित करण्यास सांगितले. पंडितांनी खेड्यातून आणि जवळपासच्या ठिकाणाहून लोकांना बोलवायला सुरुवात केली. त्यांनी 'भैरव नाथ' नावाच्या एका स्वार्थी राक्षसालाही आमंत्रित केले. भैरव नाथ यांनी श्रीधर पंडित यांना विचारले की ते हे सर्व आयोजन कसे करणार आहेत आणि त्यांनी श्रीधरला अपयश आल्यास झालेल्या दुष्परिणामांची आठवण पण करून दिली. श्रीधर पंडित काळजीत बुडाले तेव्हा दैवी मुलगी हजर झाली आणि निराश होऊ नको मी सर्व व्यवस्था केली आहे. तुझ्या लहान झोपडीमधे 360 हून अधिक भाविकांना भोजनासाठी बसता येईल असे आश्वासन दिले. यानंतर बरेच गावकरी श्रीधरच्या घरी आले आणि जेवणासाठी जमले.मग कन्या रूपी मां वैष्णो देवीने एका विचित्र पात्रातून सर्वांना भोजन देण्यास सुरवात केली. भोजन देताना कन्या रूपी मां वैष्णो भैरवनाथ जवळ गेली असता त्याने सांगितले की मी खीर-पुरीऐवजी मांस खाईन आणि मद्यपान करीन.तेव्हा कन्या रूपी माता वैष्णोने त्याला समजावून सांगितले की हे ब्राह्मणांचे भोजन आहे, मांसाहार इथे नाही केला जात. पण भैरवनाथांनी मुद्दाम हा मुद्दा मांडला.भैरव नाथ यांनी कबूल केले की या मुलीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि त्यांनी माताची पुढील परीक्षा घेण्यासाठी तिचा पाठलाग केला. माताने वायुरुप धारण केले आणि त्रिकुट पर्वताकडे गेली. भैरवनाथही त्यांच्या मागे गेले. बाणगंगा असे मानले जाते की आपल्या माताचे रक्षण करण्यासाठी पवनपुत्र हनुमान देखील होते. हनुमानजीला जेव्हा तहान लागली तेव्हा त्यांच्या आग्रहाने आईने धनुषाने डोंगरावर बाण सोडला एक प्रवाह निर्माण केला आणि त्या पाण्यात आपले केस धुतले.आज हा पवित्र प्रवाह बाणगंगा म्हणून ओळखला जातो. चरण पादुका याच ठिकाणी माता वैष्णो दोन क्षण थांबली आणि भैरवनाथ किती दूर आहे याचा अंदाज लावला. या ठिकाणी मातेच्या पायाचे ठसे अजूनही अस्तित्वात आहेत.असे म्हटले जाते की जो कोणी माता वैष्णोच्या पायांना स्पर्श करून प्रवासाला सुरुवात करतो त्याचा प्रवास यशस्वी ठरतो. अर्द्धकुमारी चरण पादुकाहुन पुढे जाउन माताने एका गुहेत प्रवेश केला आणि नऊ महिने ध्यान केले.आज जिथे माताने ध्यान केले त्या गुहेस अर्द्धकुमारी किंवा आदिकुमारी किंवा गर्भजून म्हणून ओळखले जाते. भैरवनाथही तिथेपर्यंत आले. मग एका साधुने भैरवनाथला सांगितले की तुम्ही जिला साधारण मुलगी मानता ती अदिशक्ति जगदंबा आहे, म्हणून त्या महाशक्तिचा पाठलाग करणे सोडून द्या. भैरवनाथांनी साधुचे ऐकले नाही. त्यानंतर माता गुहेच्या दुस-या बाजूने बाहेर निघुन गेली. भैरवनाथ हि माताच्या मागे गेले. भवन भैरवनाथला थांबवण्यासाठी पवनपुत्र हनुमान मधे आले आणि त्या दोघांमधे युद्ध झाले. मातेने भैरवनाथला इशारा दिला आणि परत जाण्यास सांगितले , तरीही तो ऎकत नव्हता तेव्हा माता वैष्णवींने महाकालीचे रूप धारण केले आणि भैरवनाथांचा वध केला. जिथे माता वैष्णो देवीने जिद्दी भैरवनाथची हत्या केली ती जागा पवित्र गुहा किंवा भवन म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी माता महाकाली (डावीकडील) माता महासरस्वती (उजवीकडे),आणि माता महालक्ष्मी (मध्यम) पिंडी म्हणून गुहेत बसल्या आहेत. या तिघांच्या एकत्रित स्वरूपाला माता वैष्णो देवीचे रूप म्हणतात. भैरव घाटी माताने भैरवनाथच्या मस्तकाचे शिरच्छेद केले आणि ते भवनपासून 8 किमी अंतरावर त्रिकुट पर्वताच्या भैरव खो-यात पडले. ते ठिकाण भैरोनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की त्यांच्या वधानंतर भैरवनाथांनी आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप केला आणि माताकडे क्षमा मागितली. माता वैष्णो देवीला ठाऊक होते की तिच्यावर हल्ला करण्यामागील भैरवनाथचा मुख्य हेतू मोक्षप्राप्ती करणे होता. माताने भैरवनाथाला पुनर्जन्माच्या चक्रातून केवळ स्वातंत्र्यच दिले नाही, तर त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले की जोपर्यंत माझ्या दर्शनानंतर भक्त तुमचे दर्शन करणार नाहीत तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण मानले जाणार नाही. त्याच श्रद्धेनुसार आजही, माता वैष्णो देवीच्या दर्शनानंतर भक्त भैरवनाथांच्या दर्शनासाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरावर चढून जातात. या दरम्यान, पंडित श्रीधर अधीर झाले. ते त्रिकुट डोंगराच्या दिशेने गेले त्याच दिशेने जे त्यांनी स्वप्नात पाहिले होते. अखेर ते गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले. त्यांनी अनेक पद्धतींनी देवीच्या पिंडीचे पुजन केले . त्यांच्या पूजेमुळे देवी प्रसन्न झाली. तिने त्याला दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला. तेव्हापासून श्रीधर आणि त्याचे वंशज माता वैष्णो देवीची पुजा करत आहेत. अशी हि माता वैष्णोची कथा आहे. आम्ही दुपारी 3 वाजता यात्रा सुरु केली. आमच्या हॉटेलसमोरच यात्रा नोंदणी केंद्र होते. तेथे आम्ही सर्वांनी आमची नोंदणी केली व पावती घेउन निघालो.ही पावती घेतल्यानंतरच आपण कटरा ते माँ वैष्णोच्या दरबारासाठी चढाई सुरू करू शकता. ही पावती घेतल्यानंतर तीन तासांच्या आत तुम्हाला 'बाण गंगा' चेकपॉईंटमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेथे सामान तपासल्यानंतरच तुम्ही यात्रा सुरू करू शकता. (दर्शनी दरवाजा - मागे चेकपोस्ट)

जर तुम्ही पावती घेतल्यानंतर 6 तासांच्या आत चेकपोस्टवर एन्ट्री न घेतल्यास तुमची पावती रद्द होईल. आम्ही चेकपोस्टवर पोहोचलो येथे स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा होत्या. आमची नोंदणी पावती येथे तपासली, सर्व सामानांची येथे तपासणी केली. मग आम्ही पुढे निघालो. (यात्रेच्या मार्गाची प्रतिकृती)

चेकपोस्टनंतर पहिला टप्पा आहे बाणगंगा.येथे या नदीत भक्तगण स्नान करुन पुढील यात्रा प्रारंभ करतात. आम्ही बाणगंगेचे दर्शन करुन पुढे निघालो. बाणगंगेनंतर आम्ही चरण पादुका येथे आलो.

येथे मंदीर आहे, जिथे माताचे चरण आहेत, त्यांचे दर्शन करुन जय माता दी चा जयघोष करत आम्ही निघालो. (यात्रेचा मार्ग)

यात्रा सुरु केल्यानंतर सुमारे 3 तासांनी आम्ही अर्द्धकुमारी येथे पोहोचलो. येथे गर्भजुन गुफा आहे. असे मानले जाते की मातेने या गुफेत नऊ महिने तपश्चर्या केली, आपण हे समजू शकतो की मूल जन्मापूर्वी 9 महिने आईच्या पोटातच राहतो म्हणूनच या गुफेला गर्भजुन म्हणतात. (अर्द्धकुमारी मंदीर)

गुफेचा आकार मातेच्या गर्भाच्या आकारासारखाच आहे.या छोट्या गुफेतून सर्वात मोठ्या आकाराचा माणूसही सहज बाहेर पडतो.आपल्याला त्या गुफेच्या आत जाउन यायच असत त्यासाठी आपल्याला इथे आपली नोंदणी पावती दाखवुन या दर्शनासाठी एक पावती घ्यावी लागते. आपल्याला एक ग्रुप नंबर दिला जातो आणि एका ग्रुपमधे 50 लोक असतात. एका वेळेला 5 ग्रुपला आत सोडतात. आत जाउन हि प्रत्यक्ष गुफेत जायला दीड ते दोन तास लागतात. प्रत्येकाला हि गुफा पार करायला 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ लागतो, त्यामुळे इथे खुप रांग होती. आम्ही हे दर्शन न करताच पुढे निघालो. संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय आहे. आम्ही अशाच एका भोजनालयात भोजन केले. इथे आपल्याला इडली-सांभार , राजमा-भात , कढी-भात , चहा, कॉफी, बिस्किटे अशा काही गोष्टीच मिळतात. पण इतक्या उंचावर आणि थंडीत त्या गरमागरम जेवणाची चव औरच.अर्द्धकुमारी पासुन भवन 7 कि.मी लांब आहे. जेवण करुन निघालो तेवढ्यात पाउस सुरु झाला. हा पाउस आमचा पिच्छा काही सोडत नव्हता. मग तिथेच शेडखाली थोडा वेळ थांबुन राहिलो. पाउस कमी झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली. अर्द्धकुमारी पासुन भवनपर्यंत कठीण चढाई आहे, आम्ही माताराणीचा जप करत शेवटी रात्री 1 वाजता भवन जवळ पोहोचलो. (भवन परिसर - हा आम्ही 2017 मधे घेतलेला फोटो आहे)

आपल्याला येथे क्लॉक रूम मधे आपल सामान (मोबाइल ,पर्स, कमरेचा पट्टा, शुज) जमा कराव लागत. भवन जवळ्च माताला भेट चढवण्यासाठी आपण चढावा घेउ शकतो. श्राइन बोर्डतर्फे हे दुकान आहे. येथे आपल्याला 21 रुपयांपासुन 101 रुपयांपर्यंत चढावा घेता येतो. आम्ही क्लॉक रूम मधे सामान ठेउन व चढावा घेउन दर्शनासाठी रांगेत जाउन उभे राहिलो, येथे पुन्हा एकदा आपली पावती तपासली जाते मगच आपल्याला आत सोडतात. प्राचीन मुळ गुफ़ा जि आहे ती आजकाल वर्षातील बराच काळ बंद ठेवली जाते कारण ही गुफ़ा खूपच लहान आहे. एकेका माणसाला ती पार करुन जायला कित्येक मिनिटे लागतात.प्राचीन मूळ गुफा कमी गर्दीच्या दिवसांवर किंवा पारंपारिक उत्सव किंवा धार्मिक प्रसंगी उघडली जाते. या गुहेतून माता राणीला भेट देणे हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. (प्राचीन मूळ गुफा - जालावरुन साभार)

त्यामुळे अधिक प्रवाश्यांना दर्शन सुविधा देण्यासाठी दोन नवीन टनेल (बोगदा) मार्ग वापरले जातात. प्रवेशासाठी एक बोगदा वापरला जातो जो थेट माताराणीच्या पिंडींजवळ जातो. दुसरा बोगदा दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी वापरला जातो. (नवीन मार्ग -जालावरुन साभार )

आम्ही गेलो तेव्हा खुप गर्दी असल्यांमुळे आम्हाला ही नव्या मार्गाने जावे लागले. आम्ही प्राचीन गुफेच्या जागेवरुन पुढे एका कॉरिडॉर मधे पोहोचलो, ज्याच्या छतावर अनेक घंटा लटकलेल्या दिसतात.काही अंतर चालल्यानंतर, आम्ही एका खुल्या जागी पोहोचलो जिथे मातेच्या वाहनाचा सिंहाचा पुतळा ठेवलेला आहे आणि मातेचा संपूर्ण पुतळा ठेवलेला आहे. इथुन बोगद्याचे प्रवेशद्वार आहे. बोगद्याच्या शेवटी संगमरवरी दगडाचा उंच व्यासपीठ आहे ज्यावर माता राणी नैसर्गिक खडकांच्या पिंडींच्या स्वरुपात विराजमान आहे. गुफेत चित्रे किंवा मूर्ती वगैरे नाहीत. आत गेल्यावर तिथे बसलेले भटजी आपल्याला तिलक लावतात व आपल्याला पिंडींची माहिती देतात. (वैष्णोदेवी पिंडी दर्शन - जालावरुन साभार)

गर्दी खुप असल्यामुळे आपल्याला आत जास्त वेळ थांबता येत नाही. माताचे दर्शन होताच डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. 2012 नंतर आता 2020 पर्यँत आम्ही प्रत्येक वर्षी वैष्णोदेवीला जातोय, आताही जेव्हा मातेचे दर्शन करतो तेव्हा डोळ्यातुन अश्रु येतात, मग हि तर पहिलीच वेळ होती मातेच्या सामोरी जाण्याची. असे म्हणतात की माता ज्यांना बोलावाते तेच लोक मातेच्या दर्शनासाठी येउ शकतात आणि आम्ही ते भाग्यशाली होतो. मनोमन मातेचे धन्यवाद मानले. माताराणीकडे प्रार्थना केली" हे भगवती माते तु असेच आमच्यावर तुझे कृपाछत्र ठेव. तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुदे. पुन्हा पुन्हा तुझ्या दर्शनाला आम्हाला बोलाव. जय माता दी !" दर्शन करुन बाहेर आलो व क्लॉक रूम कडे सामान घ्यायला निघालो. दर्शनाला येतानाच आप्ल्याला चढावामधे असलेला नारळ जमा करुन त्याबदल्यात प्रसादीचा कुपन देतात. आम्ही तो कुपन देउन अर्धा नारळ घेतला. प्रत्येकाला प्रसादी मधे खडीसाखर व एक सिक्का देतात ज्यावर पिंडी कोरलेली असते व वर्ष हि लिहलेले असते. (माझ्याजवळ आता २०१३ आणि २०१८ चे सिक्के आहेत)



क्लॉक रूम मधुन सामान घेउन आम्ही आता पुढे भैरवनाथ दर्शनासाठी निघालो. भवनपासुन भैरवनाथ मंदीर 1.5 कि.मी अंतरावर आहे. त्यासाठी आपल्याला कठीण चढाई करावी लागते. आम्ही 2 वाजता भैरवबाबांची यात्रा सुरु केली. आता पाय खुप दुखु लागले म्हणुन आम्ही हळुहळु चालत होतो. रात्री 3.30 वाजता आम्ही भैरवनाथ दर्शन केले. (भैरवनाथ मंदीर - जालावरुन साभार)

भैरवनाथहुन खाली पाहिले असता भवन चा वाघाच्या आकाराचा सुंदर नजारा दिसतो.

थोडा वेळ तेथे बसुन आम्ही मग कटरा कडे प्रस्थान केले. एवढी पायपीट करुन आता आम्ही खुपच थकलो होतो. माता राणीचा जप करत हळुहळु उतरायला लागलो. (खाली उतरत असताना झालेले कटरा शहराचे विहंगम दर्शन)

सकाळी 9.30-10 पर्यंत खाली कटराला आलो. हॉटेल रुमवर जाताच कपडे बदलुन व हातपाय धुउन सरळ झोपुन गेलो. याप्रकारे आमचे वैष्णोदेवी दर्शन झाले. जय माता दी क्रमशः






नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा

नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा                   भाग १      शनिवार दि.११ मे २०२४. मे महिन्यातील कडकडीत उन्हाचा त्रास वाचावा म्हणून मी आणि शि...