Friday, June 19, 2026

राजस्थान ट्रिप

 

तयारी, भाग १

लेखकजेडीयांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले.

राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.
आम्ही सात जण जाणार होतो. पैकी सहा जण पुण्यातून आणि एक जण गुडगावमध्ये जॉईन करणार होते. आम्ही सप्टेंबरमध्येच जाण्याची 'एअर इंडिया' आणि परतीची इंडिगोची विमान तिकीट बुक केली. “हे पाहू, ते पण पाहू” करत करत अखेर १४ दिवसांची ट्रिप ठरली. “परत कधी येणार आहे, आताच पाहू” असे म्हणत आम्ही हा भारी-भक्कम प्लॅन आखला.
नुसती तीन महिने आधी तिकीट बुक करून आम्ही खुश होतो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा हॉटेल बुक करायला लागलो, तेव्हा हॉटेल्सचे दर तिप्पट वाढलेले दिसले. जवळपास दोन महिने हॉटेल्स, Airbnb शोधणे, काय पाहायचे त्याची यादी करणे सुरू होते.
आमचे दादा-वहिनी परत इकडे येतील याची शक्यता खूप कमी असल्यामुळे ताजमहाल पाहायचे ठरवले. तीनदा दिल्लीला जाऊनही संसद भवन पाहायचे राहून गेले होते, म्हणून तेही कव्हर करायचे होते. कोण तिकडे फिरायला गेले आहे, काय चांगले आहे यावर ऑफिसमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा झाल्या. भरपूर व्हिडिओ पाहिले.
“एअर इंडिया चे तिकीट कशाला काढलेस?” म्हणून मला प्रत्येकाने सुनावले, पण नंतर इंडिगोचा गोंधळ पाहून मी स्वतःला नशीबवान समजले.
जातेवेळीची फ्लाइट सकाळी साडेसहाला होती आणि साडेआठला पोहोचणार होती. दिवसभर आम्ही दिल्लीमध्ये जे पाहता येईल ते पाहून दुसऱ्या दिवशी आग्र्याला मुक्कामाला जाणार होतो. पण अचानक एअर इंडियाकडून फ्लाइट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला. त्यांनी दोन ऑप्शन दिले – रि- शेड्यूल करा नाहीतर रिफंड घ्या. आम्ही आधीच हॉटेल बुक केली होती, त्यामुळे दिलेल्या दोन ऑप्शनपैकी एक आम्ही रीश्येडूलचा पर्याय निवडला.आमच्या पैकी दोन जण पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होते, त्यामुळे त्यांना विमानातून खाली शहर दिसावे म्हणून तीन विंडो सीट मिळतील अशा पद्धतीने सहा सीट बुक केल्या, होत्या. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजले होते पण फ्लाइट कॅन्सल झाल्यावर दुसरी निवड करताना सीटबद्दल विचारायचे आम्ही पूर्णपणे विसरलो.
जेव्हा बोर्डिंग पास हातात आले, तेव्हा शेवटच्या ओळीतल्या सहा सीट आम्हाला मिळाल्या होत्या. त्यात विंडो शेजारी बसलेल्यांना नुसता विमानाचा पत्राच दिसत होता. आम्ही सगळे एकाच ओळीत बसलो होतो. रात्रीची वेळ असल्याने सगळे विमानात झोपले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर मात्र थंडीत अक्षरशः गारठून गेलो.
आधीच्या वेळेनुसार आम्ही दिल्लीला पोहोचून संसद भवन, इंडिया गेट पाहून रात्री आग्र्याला जाणार होतो. पण वेळ बदलल्यामुळे “दिल्लीला पोहोचल्यानंतर काय करायचे ते तिथे ठरवू” असे ठरवले आणि थेट वृंदावनला जायला निघालो. दादा-वहिनींना वृंदावनातील बांके बिहारी आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमी पाहायचे होते, म्हणून त्याप्रमाणे जायचे ठरवले.
पूर्ण पंधरा दिवसांत रोज काय पाहायचे, एका दिवसात किती स्थळे पाहायची, सगळे नाही जमले तर काय सोडायचे—याचे पूर्ण नियोजन केले होते. त्यासाठी गुगल शीटवर तारखेनुसार आणि वेळेनुसार स्थळे, हॉटेल्स, प्रवासाची वेळ अशी सगळी माहिती भरली होती.
हॉटेल बुक करणे हे एक दिव्यच होते. रेटिंग, बजेट, रिव्ह्यू, तारखा जुळवणे—सगळेच कठीण होते. प्रत्येक ठिकाणी फोन करून विचारायचो की सात लोकांना दोन रूम मिळतील का, आम्ही निवांत झोपू शकू का, आणि २४ तास गरम पाणी मिळेल का. बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स तीन रूम घ्या असे सांगत होते, पण त्यामुळे बजेट खूप वाढणार होते. पुन्हा फोन, पुन्हा तेच प्रश्न—असेच जवळपास दोन महिने चालले.
शेवटी आम्ही तीन ठिकाणी होम स्टे, तीन ठिकाणी हॉटेल आणि वाळवंटात सॅंड ड्युन कॅम्प बुक केला.

ठिकाण हॉटेल / होम स्टे कालावधी आमची रेटिंग
ब्रज निवास हॉटेल (फक्त फ्रेश होण्यासाठी) २ तास ⭐⭐⭐
आग्रा गोयल पॅलेस १ दिवस ⭐
जयपूर लीला होम स्टे ३ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
उदयपूर घराना Airbnb २ दिवस ⭐⭐⭐
जोधपूर हॉटेल स्टार इन २ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज २ दिवस ⭐⭐⭐
सॅंड ड्युन प्रिन्स डेजर्ट कॅम्प १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज १ दिवस ⭐⭐⭐
दिल्ली होम स्टे, ग्रेटर कैलाश १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
आणखी बरीच तयारी केली—उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ, बॅगांचे वजन, किती बॅगा घ्यायच्या, औषधे इत्यादी.
सर्वात महत्त्वाची तयारी होती ती दिल्लीपासून परत दिल्लीला येईपर्यंत फिरण्यासाठी कॅबची. आम्ही इनोव्हा क्रिस्टा बुक केली. जरी आम्ही सात जण असलो, तरी त्यात १२ वर्षांवरील दोन मुले होती, त्यामुळे कॅरियर असलेली कॅबच घेतली. ही कॅब आम्ही गुगलवर शोधली होती आणि त्यांनी खरंच अफलातून सर्व्हिस दिली. कोणी विचारले तर मी नक्की डिटेल्स देईन.
सर्वात महत्त्वाची तयारी बॅगांची होती. त्या कॅरियरवर मावतील अशाच घ्यायच्या होत्या आणि फक्त चारच बॅगा घ्यायच्या ठरवल्या. त्यात एक तीन-बॅगांचा सेट आणि एक मिडियम साईज बॅग घेतली.
बरंचसं खाण्याचं सामान, मास्क, मेकअप साहित्य, मॅगी, चहा, साखर इत्यादी आमच्या गुडगावच्या मेंबरने आणले.

पुढील सर्व ट्रिपचे रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी आणि राजस्थान का पहायचे होते हे वाचण्यासाठी भेटूया पुढच्या भागात...


डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही दिल्ली एअरपोर्टवर पहाटे ५ वाजता पोहचलो. फ्रेश होऊन कॅब ज्यांची होती त्या प्रदीप भाईंना फोन केला , त्यांनी आमच्या बरोबर येणाऱ्या ड्राइव्हरचा फोन नंबर शेअर केला होता. त्यांनाही फोन केला. त्यांनी १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि पोहचलेसुद्धा. बॅगा कॅरीअरवर चढवून आम्ही वृंदावनला निघालो. जाताना आमच्या गुडगावच्या मेंबरला घेतले. तिने खाण्याचे पदार्थ, साखर, पावडर, कॉफी, मॅगी , शॅंपू, साबण असे सामान आणले होते. ते डिकीत चढवले . यमुना एक्सप्रेस वे वरून आम्ही वृंदावनला निघालो.
डिसेंबरमध्ये दिल्ली भागात प्रचंड धुके असते. खरेतर रात्रभर जागुन प्रचंड झोप आली होती तरीही समोरची धुके पाहुन गाळण उडाली. वेग अत्यंत कमी होता. मधुनच कोठे ट्रक आडवा येतोय, गाडी येतीय, अगदी समोर आली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारल्यावर काही समोर आहे याचा पत्ता लागायचा. अजूनच घाबरायला होत होते. सकाळी ९-९ः३० वाजले तरी धुके होतेच. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर मात्र भितीचा लवलेश नव्हता. हिटर लावुन ते निवांत गाडी चालवत होते.
१०ः३० च्या दरम्यान आम्ही वृंदावनात पोहचलो. प्रचंड थंडी, स्वेटर, शाल , कानटोपी , शुज, मोजे घालुन बसलेले तरीही थंडी वाजतच होती. ब्रजनिवास या हॅाटेल ला आम्ही फोन केला, फक्त फ्रेश व्हायचे होते, सातमधल्या दोन जणांनी फक्त अंघोळ केली कारण पाणी गरम होत नव्हते. वृंदावन मथुरा येतील सर्व मंदिरे सकाळी ८-९ वाजता चालु होवून दुपारी बारा/एक वाजता बंद होतात. दुपारी ४ वाजता पुन्हा उघडून रात्री ८-९ ला बंद होतात. आम्ही फक्त बाके बिहारी मंदीर आणि निधी वन पाहणार होतो. दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असते. लोक मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर जी प्रसाद, फुलं वैगेरे साठी जी दुकान होती त्यांच्याकडे चप्पल, शूज ठेवतात. अतिशय अरुंद गल्ल्या , त्यामुळे गाडी आपल्याला कोठेतरी लांब अंतरावर सोडते. तिथुन पुढे ई- रिक्षा आपल्याला मंदिराच्या जवळच्या गल्लीत सोडतात. सातही जणांना एका रिक्षात कोंबून आम्ही जवळपास च्या गल्लीत पोहचलो . २०० रुपये घेतले. तिथुन पुढे लोक पळत आहेत तिकडे पळायचे. वृंदावनात माकडे चष्मा, गॉगल पळवतात त्यामुळे तो गाडीतच ठेवुन जायचा पण मुलं ऐकत नसतात. आम्ही पर्स मध्ये ठेवतो म्हणुन घेतलाच. कानात वारे भरते त्यांच्या, त्यामुळे आपण काही सांगितले तरी ते ऐकत नसतात.

प्रचंड गर्दी , उघडी गटारे, खच्च भरलेले रस्ते. फुल प्रसादाची दुकाने, मुंग्यासारखी माणसं…
जय कन्हैया लाल की , हाथी घोडा पालखी .
राधे राधे , राधे राधे..ने सर्व परिसर नुसता दुमदुमत असतो . जयघोष सुरु असतो . भक्त टाळ्या वाजवत असतात. भजन म्हणत असतात.
बाके बिहारी मंदिराच्या दर्शन रांगेत आम्ही उभे राहयलो. अंतराळीच मंदिरात पोहचलो. गर्भग्रुहाचा पडदा उघडत होता . झाकत होता. फुलांची परडी , हार देण्यासाठी देणगी मागत होते नाहीतर तो हार त्या हारांच्या ढिगाऱ्यात फेकायचे आणि अंतराळीच दुसरीकडे कोठेतरी बाहेर पडायचे . परत चप्पल, शूज मिळवण्यासाठी गल्ली शोधायची, मग आपल्या चपला बुटे त्या ढिगातुन शोधायचे. नशीब असेल तर दोन्ही वेळेवर मिळतात अन्यथा दुसरी चप्पल बुट शोधायला अर्धा तास पक्का.
मागे एकदा आम्ही आणि आमची मुलगी असे आम्ही वृंदावन ला गेलो होतो. २-३ तास रांगेत उभे राहिल्यावर माझी मुलगी मी आता रांगेत थांबणार नाही म्हणाली. प्रचंड पाय दुखत होते पण तिला तसेच समजावून सांगत होते तोवर एक मोठा सांड गर्दीत घुसला. लोक त्याची शेपटी पिरगाळत होते. उधळला तर काय होईल? 40-50 तरी नक्की मरतील अशी परिस्थिती होती पण लोक तरीही त्याला चुचकारत होते. मग मात्र माझी मुलगी रांग सोडुन मागे जायला लागली. सर्व लोक आम्हाला दर्शन न घेता चाललो म्हणुन काहीही बोलत होते. शेवटी आम्ही त्या दिवशी दर्शन घेतले नाही. मथुरा आग्रा पाहुन तिसऱ्या दिवशी सकाळी मी एकटीने दर्शन घेतले.
असो , हे अवांतर सांगितले आणि त्याला कारण पणतसेच आहे. यावेळी मुलीने दर्शन रांगेत उभा राहण्यास किरकिर केली नाही. कारण मुलीच्या ॲाफिसमधले तिला म्हणाले होते,
“बाके बिहारी का बुलावा आता है, ऐसेही नही जाता कोई वृंदावन”
बाके बिहारी दर्शन करुन आम्ही निधी वनात गेलो. भगवान कृष्ण तिथे रासलीला रचतात. रात्री तिथे कोणीही जात नाही नाहीतर आंधळे होतं अशी आख्यायिका आहे. पुर्ण जाळीने पॅक केलेल्या तुळशीच्या वनातून आमचे एक एक पाऊल पुढे पडत होते. भजन म्हणत होते, फुलांच्या परड्या सावरत त्यातुन मार्ग काढत होते.
राधे राधे राधे राधे
परिसर नुसता दुमदुमून गेला होता. त्यातही जाळीवरुन माकडे उड्या मारत होती. एका छोट्याशा मंदिरात कृष्णाची सेज रात्री सजवतात आणि सकाळी ती अस्ताव्यस्त होत असते अशीही आख्यायिका आहे.
लोक राधाराणीला साज शृंगार पेटी चढवत होते, बांगड्या, कुंकु पावडर, अत्तर, साडी असे त्या पेटीत असते, काही लोक दक्षिणा देतात.
माझी मुलगी गर्दीतुन वाट काढत तिच्या चुलत बहिणीला घेवुन वाट काढत पुढे जात जिथे थोडी रिकामी जागा आहे तिथे जाळीला पाट टेकून उभी राहिली. त्या जाळीजवळ येऊन माकडाने तिचा चष्मा एवढ्या छोट्या जाळीतुन ओढला , लोकांनी जवळचे लाडू, प्रसाद दिले त्या जाळीतुनच पण माकडाने लाडू खाल्ले पण चष्मा काही दिला नाही. तिने ५ हजार खर्चून तो लेन्सकार्ट मधुन दोनच दिवसांपूर्वीच घेतला होता. मी तिच्यावर चष्मा का घातलास म्हणून आणि ती माझ्यावर तु ह्या निधी वनात कशाला घेवुन आलीस म्हणुन करवादत होती.
सगळा मुड गेलेला, भुक लागलेली. आम्ही गुगलवर रेटिंग पाहुन एक हॅाटेल निवडले. रिक्षा वाल्यांना तिथे पोहोचायला सांगत होतो पण कोणालाही ते कोठे आहे माहीत नव्हते. शेवटी एक रिक्षावाला म्हणाला, “कहासे ढुंढा है, ब्रजवासी में जाओ!”
आम्ही तिथे गेलो, जेवण खुप छान होते. सेल्फ सर्व्हीस आहे. जेवुन बाहेर येवुन आमच्या गाडीची वाट पाहत होतो तोवर तिथे आलेल्या अजुन एकाचा चष्मा (आमच्यापैकी नाही )माकडाने पळवला. मुलीने परत मला वृंदावनात आल्याबद्दल सुनावले.

नंतर आम्ही मथुरेला गेलो , कृष्णजन्मभुमी पाहिली, माझी मुलगी तिथेही आत आली नाही. रात्री आम्ही आग्र्यात मुक्कामी पोहचलो. तिथले गोयल पॅलेस नावाचे हॅाटेल आम्ही बुक केले होते. प्रचंड थंडीमुळे सर्व ठिकाणी छोट्या छोट्या कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या होत्या. आमची रुम तिसऱ्या मजल्यावर होती, लिफ्ट नव्हती, बॅग वर चढवायला कोणीही हेल्पर नव्हता. हॅाटेल बुक करताना तो माणूस प्रचंड गोड बोलत होता. ऐनवेळी हॅाटेल चेंज करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी पीक सिजन असल्याने दर अतिशय महाग होते आणि बुकिंग फुल होते.गरम पाणी सकाळीच मिळणार होते, एक्सटेंशन फोन चालत नव्हते. अतिशय थंड पाण्याने फ्रेश झालो. जेवायला त्यांच्याच दुसऱ्या जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. अतिशय घाणेरडे जेवण.. जाता जात नव्हते.
सकाळी अंघोळ करुन आम्ही बॅगा कॅरीअर वर चढवल्या. रस्त्यात देवीराम स्विटस् मध्ये आम्ही बेडई पुरी , जिलबीवर ताव मारला. सकाळी सकाळी प्रचंड गर्दी होती.चव अप्रतिम होती. नाश्ता करुन आम्ही ताजमहाल पाहायला गेलो.

गाडी पार्किंग पासून पुढे १ ते १.५ किलोमीटर चालत जावे लागते. तिथे असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्ट मधुन ताजमहालला पोहोचलो. गाडी पार्क करेपर्यंत हजार लोकं विचारायला येतात, गाईड आणि गाडी साठी पण तिथुन सरळ पुढे गेल्यावर सरकारी कार्ट असतात, त्यांचा रेटही २० रुपये पर पर्सन असतो. आरामात पोहचलो. तिकीट ॲानलाईन काढले होते. प्रचंड गर्दी,आत जाण्यासाठी भरपूर गेटस्, चेकिंग. पाणी नेता येत पण खाण्यासाठी काहीही नेता येत नाही. कडक चेकि्ग करतात. आत गेलो पण ताजमहाल धुक्यात हरवला होता. इतकी गर्दी असुनही आत आल्यावर ती गर्दी ताजमहालात सामावली आणि तरीही भरपूर रिकामी जागा होती इतका मोठा परिसर आहे. शू कवर घालून आपल्याला मुख्य इमारती मध्ये प्रवेश मिळतो. वर जाण्याचे वेगळे तिकीट आहे, आत ताजमहाल , म्युझियम आणि मशिद आहे , सुंदर बाग आहे. ऊन अजिबात नव्हते, सकाळच्या वेळी ताजमहाल अतिशय सुंदर दिसतो. तो एक अनुभव आहे.

ताजमहाल पाहुन आम्ही आग्रा फोर्ट पाहिला, शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याच्या फोर्ट समोर आहे. मन भरून येते तो पुतळा पाहुन. इथे गाईड आवर्जून घ्यावा , छान माहिती सांगतात, छान फोटो काढतात.

फोर्ट पाहुन आम्ही जयपूर ला निघालो. रात्री ९.३० च्या दरम्यान आम्ही जयपूरला पोहचलो.

इथुन पुढे राजस्थान ट्रिप चालु.. त्याविषयी तिसऱ्या भागात…


रात्री ९:३० च्या दरम्यान आम्ही लीला होम स्टे ला पोहचलो. अतिशय चांगले एअर बी ॲंन्ड बी आहे. शहराच्या थोडे बाहेर आहे पण आमच्याकडे गाडी होती त्यामुळे काही फरक पडला नाही. त्या रात्री आम्ही बाहेरून झोमॅटावरुन काही बाही मागवले. तिथे बिसलरी पाणी बॅाटल्स, चहा पावडर,  कॅाफी एनर्जी ड्रिंक्स, भांडी असे बरेच साहित्य होते. ३ बेडरूम, मोठा हॅाल, टिव्ही, गिझर असे बरेच साहित्य होते. त्यामुळे इथला स्टे खूपच सुखकर होता.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून आवरले आणि सकाळी साडेआठच्या दरम्यान हवामहालाजवळ पोहचलो. फोटो काढले आणि नंतर  आत हवामहाल पाहण्यास गेलो. हवामहाल पाहण्यास २ तास खुप होतात.  एका बाजूला जीने आणि दुसऱ्या बाजूला चालत ही वरच्या मजल्यावर जाता येते. छोट्या छोट्या खिडक्या, आरशांचे नक्षीकाम आणि खुप सारी दालने. ह्या खिडक्यातुन आपण रस्त्यांवर चाललेली वाहतुक पाहु शकतो, वरून आपण सर्व पाहु शकतो पण खालून पाहणार्यांना आपण दिसत नाही.  मुख्य आकर्षण त्या आरशाचे नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि दालने इतकेच आहे. ती हवामहालाची इमारत जितकी फोटोत सुंदर दिसते तितकी दिवसा सुंदर दिसत नाही. रात्री समोरच्या कॅफेतुन खुप सुंदर दिसते असे म्हणतात पण त्या कॅफेचे रेट्स खुप आहेत आणि वेटिंगपण खुप असते म्हणुन आम्ही रात्री गेलो नाही. 

 हवामहल पाहुन आम्ही सिटी पॅलेस पाहायला गेलो. सिटी पॅलेस मध्ये म्युझियम, सर्वात मोठे झुंबर , सर्वात मोठे चांदीची गंगाजली, शस्त्रे , पुर्वी पासुनची वाहने जसे की मेने, पालख्या , अंबाऱ्या, जुन्या बग्ग्या , हत्तींची आभूषणे, राजा महाराज्यांचे कपडे असे बरेच पाहण्यासारखे आहे. सिटी पॅलेस मध्ये आम्ही गाईड घेतला होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आताचा राजा  जो त्यांच्या मुलीचा मुलगा आहे , राजा पॅलेस मध्ये आहे की नाही कसे ओळखायचे वगैरे.. कोणत्या राजाने जयपूर वसवले .. असे बरेच काही. ते पाहता पाहता ऐकणे ह्यात वेगळीच मजा आहे. आजही ह्या पॅलेस मध्ये काही भागात राजाचे वास्तव्य आहे. तिथे आतमध्ये पश्मिना शालींचे दुकान आहे. ते दुकान राजाने त्यांच्या खानदानी शाली पुरवणार्या कुंटुबाला दिले आहे. ह्या शाली विशेष जातीच्या मेंढ्या च्या दाढी च्या तेलापासून कश्मीर मध्ये बनतात पण त्यावरचे रंगकाम राजस्थानात बनते. ही शाल उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम आणि अतिशय पातळ असते. ती ओरिजनल आहे की नाही हे ओळखायची खुण म्हणजे ती जळल्यावर केस जळाल्याचा वास येतो. हे प्रात्यक्षिक ते करुन दाखवतात. छोट्या रिंग मधुन ती आख्खी शाल पास होते. किमतीही प्रचंड आहेत. सर्व पाहुन झाल्यावर गाईड आपल्याला त्या दुकानात घेवुन जातात. पण इंटरनेट वर ते फसवतात असा रिव्ह्यू आहे त्यामुळे माझी इच्छा असतानाही घरचेयांननी घेवु दिली नाही.

आम्ही गेलो त्या दिवशी संध्याकाळी तिथे एक लग्न होणार होते त्यासाठीची सजावट चालली होती त्यामुळे काही भाग पाहता आला नाही त्यामुळे अतिशय वाटले कारण सिटी महाल पाहण्यासाठीचे तिकीट दर माणशी ३१० रुपये होते. २ तासात सिटी महाल पण पाहुन होतो.

 अजुन एक गोष्ट इथे समजली ती म्हणजे जयपूर हे शहर राजा सवाई जयसिंग यांना पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी किल्ल्याच्या खाली शहर वसवले आणि त्यांच्या नावावरून जयपूर हे नाव पडले.

 सिटी महालानंतर आम्ही जंतरमंतर ला गेलो. जंतरमंतर ही सुर्य नक्षत्रे यांच्या स्थानांवर आधारित एक प्रयोगशाळा आहे . भाततात अशा ५ जंतरमंतर आहेत पण सर्वात मोठे जयपूरला आहे. ह्या सर्व राजा जयसिंग दुसरा  यांनी बांधलेल्या आहेत. तिथे सुर्याच्या उन्हावर किती वाजले ते ओळखण्याचे घड्याळ आहे, म्हणजे खरंतर ती एक स्केलच आहे. अचूक वेळ दाखवते.  इथे आम्ही गाईड न घेतल्याने फार काही माहिती नाही मिळाली.माणुस जिथे जातो तिथे तो घाण करतो त्यामुळे ह्यातील बराच भाग आता पाहता येत नाही.  

हे सर्व पाहोपर्यंत दुपारचे दोन अडीच  वाजले. प्रचंड भुक लागली होती. जेवण्यासाठी आम्ही चांगले रेटिंग असलेले हॅाटेल गोविंदम शोधले. गोविंदम मध्ये छोट्या लोखंडी जिन्याने वर चढुण जायचे , त्यावर चढताना वर एवढे चांगले हॅाटेल आहे असे वाटलेच नाही .  पण हॅाटेल अतिशय चांगले आहे. प्रचंड भुक लागली होती , पण वेटिंग टाईम खुप होता. अतिशय सुंदर आवाजात दोन गायक तबला पेटी वाजवत गात होते. काही कस्टमर त्यांना रेकॅार्ड करत होते. त्यातील राजस्थानी थाळी ७००  रुपये होती. मी आणि वहिनी दोघींनी ती घेतली , थाळी अतिशय चविष्ट होती. पण बाकीच्यांनी पंजाबी जेवण मागवले आणि ते बेचव होते. जेवणाच्या किमतीच्या मानाने राजस्थानी जेवण चांगले पण पंजाबी बेचव. रेटिंग च्या बाबतीत आमचे दोन गट पडले. आम्ही ५ स्टार देवु इच्छित होतो तर बाकीचे १ स्टार वर ठाम होते.  

 

जेवण करुन बाहेर यायला चार साडेचार झालेले, शेवटी आम्हाला अल्बर्ट हॅाल पाहायचा होता. जयपूर ला पिंक सिटी का म्हणतात तर ह्याला हे अल्बर्ट साहेब कारणीभूत आहेत . त्यांच्या स्वागतासाठी राजा सवाई राम सिंह यांनी सर्व शहरांच्या इमारती ह्या टेराकोटा पिंक कलर मध्ये रंगवल्या. त्यामुळे तिथले सर्व घरे गुलाबी दगडात बांधली आहेत वैगेरे सर्व खोटं आहे.

अल्बर्ट हॅाल म्हणजे एक म्युझियम आहे , ह्यात विविध चीनीमातीची भांडी, सुंदर नक्षीकाम केलेल्या फ्रेम्स असे बरेच काही आहे. बाहेरच असणाऱ्या छोटेखानी कॅन्टीन मध्ये आम्ही चहा पिला , दिवसभर चालून पाय दुखत होते पण त्या दिवसाचा शेवटचे स्थळ चोखीदानी होती. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आम्हाला सकाळी हवामहल ला सोडुन पार्किंग साठी निघुन गेला. हवामहल, सिटी पॅलेस, जंतरमंतर वॅाकिंग डिस्टन्स वर आहे. गोविंदम ला आम्ही रिक्षाने गेलो. तिथुन पुढे आम्ही गाडीने अल्बर्ट हॅाल ला गेलो आणि  नंतर चोखीदानी ला पण गाडीने गेलो. चोखीदानीचा पार्किंग साठी मोठी जागा आहे.

 

चोखीदानी पुण्यात पण आहे आणि मी पाहिलं आहे पण बाकींच्यांना खुप उत्साह होता. चोखादानीचा दर माणशी १२०० रुपये रेट होता. संध्याकाळी पाच नंतर चालु होते.  तिथले ढोल वाजवत होणारे स्वागत, तिलक लावुन सरबत देतात.  अतिशय छान वाटते. लोक त्या ढोलाच्या तालावर नाचायला लागतात. 

आतमध्ये विविध खेळ, कटपुतली, विविध राजस्थानी कला यांचे प्रदर्शन असते . परातीवर, परातीत काचा टाकून , एकावर एक हांडे ठेवुन काही स्त्रिया डान्स करतात. जादुगर, डोंबारी खेळ, विविध आदिवासी डान्स असे बरेच काही असते. लोक स्वतः पण त्यांच्या बरोबर डान्स करत असतात. बाजेवर बसुन बरेच ठिकाणी काहीबाही खाता येतं, शेकोट्या पेटलेल्या असतात. एक प्रकारची जत्राच ही.  हत्तीची सफारी पण आहे पण ती मात्र नको वाटली पाहायला, हत्ती थोड्याच अंतरात लोकांना घेवुन फिरत होता. जादुगर सुद्धा ज्या पद्धतीने कबुतरांना हाताळत होता ते पाहुन वाईट वाटले पण बाकी अनुभव अफलातून होता. तिथल्या कलाकारांनी पैशाची डिमांड केली तर पैसे न देता तक्रार करा असे फलक लिहिले आहेत पण तरीही ते लोक पैसे मागतात आणि लोकही देतात. सर्वात शेवटी राजस्थानी थाली जेवायला मिळते. ती मात्र पुण्यातील चोखीदानीच्या थाळी सारखी नव्हती. बाजरीचा खिचडी, काही दुकाने आहेत त्यात राजस्थानी कलाकुसर असलेले कपडे, रजया, पर्स, झुंबरे , लाकडी शोपीस असे बरेच काही खरेदी करता येते. पॅाटरी,  माघावर विणकाम हे सर्व स्वतः अनुभवता येतं एकंदर मजेचा दिवस. 
 

पुढच्या भागात अमेर फोर्ट, नहार फोर्ट याविषयी ..






























































हंपीचा ध्यास

 हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.

हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.

तरी घरी आल्यावर ते भग्न अवशेष, तरीही ती भव्यता हे सर्व कसे साकार झाले आणि मग हे सर्व कसे नष्ट झाले, याचे मनाला खूप कुतूहल होते. यासाठी मग पुस्तक वाचायला सुरुवात केली.

रोबर्ट सेल चे A Forgotten Empire: Vijayanagar – A Contribution to the History of India पुस्तक आणि Fritz & Michell चे Hampi Vijayanagara आंतरजालावर उपलब्ध आहे. या पुस्तकांत डोमिंगोस पेस (१५२०-२२) आणि फर्नाओ नुनिज (१५३५-३७) यांनी हंपीला भेट दिल्याचे वर्णन आहे. तसेच तारीख-ए-फरिश्ता (गुलशन-ए-इब्राहीमी) हे पुस्तकाचाही संदर्भ म्हणून वापर केला आहे

हे सर्व वाचून आकलन होण्यासाठी तीन महिने लागले. मी अजूनही या सर्वांचे बारकाईने वाचन करत आहे.

समजलेली माहिती उतरवून त्यावरून AI ने सुरेख चित्रे तयार केली, जी खरोखरच खूप रोचक आहेत.

मिपाची थोरवी पाहता, पूर्ण बारकाईने काही पैलू अभ्यासल्यावरच लिखित माहिती द्यावी, असा मानस आहे.

तूर्तास ज्यांना हंपीला भेट द्यायची असेल, त्यांच्यासाठी ही हंपी इतिहासाची चित्रमालिका आहे. हंपी स्थापत्याबाबत इथे निवांतपणे लिहिणारच आहे.

ही मालिका हंपी (विजयनगर साम्राज्य) चा इतिहास सोप्या, वाचनीय मराठीत आहे. पौराणिक कथा, राजवंश (संगम → सालुवा → तुलुवा → आरविडू), युद्धे, राजकीय डावपेच आणि सांस्कृतिक पैलू यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. एकूण ७-८ भाग आहेत

 

१.उगम आणि पौराणिक कथा: पम्पा-शिव कथा, हेमाकुटा, विरुपाक्ष मंदिराचा इतिहास, किष्किंधा (रामायण काळ) यांचा उल्लेख. चालुक्य, होयसळ, कंपिली राजवटींचा परिचय. उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे आणि दक्षिणेतील धोका याचे चित्रण केले आहे.भाग-१

१

 

२.संगम राजवंश (हरिहर-बुक्का): हरिहर-बुक्का बंधू, होयसळ साम्राज्याचा अंत, बहमनी सत्तेचा उदय (गंगू ब्राह्मण कथा), प्रारंभिक विस्तार. इब्न बतूताच्या वर्णनातून मदुराई सुलतानाची क्रूरता दाखवली आहे.
भाग-२

२

३.हरिहर द्वितीय,पंगळ युद्ध (बहामनींवर निर्णायक विजय).
भाग  ३

४

४.देवराय प्रथम: अडोनी वेढा, गोवा-चौल जिंकणे, पार्थल (सोनाराची मुलगी) प्रेमकथा (फेरिश्ता नुसार, अतिरंजित असू शकते),  देवराय प्रथमने सैन्य सुधारणा, घोडदळ मजबूत करणे यावर भर.
भाग-४

५.देवराय द्वितीय: बहमनी व गजपतींशी अनेक युद्धे, मुस्लिम धनुर्धाऱ्यांची भरती, दक्षिण व पूर्वेकडे विस्तार. संगम वंशाचा ऱ्हास.
भाग ५

५

६.सालुवा राजवंश: नरसिंह देवराय, गजपतींशी उदयगिरी युद्ध (पराभव), पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे जिंकणे. छोटा पण महत्वाचा संक्रमण काळ.

भाग 


७.कृष्णदेवराय (सुवर्णकाळ): तुलुव वंश, रायचूर युद्ध (१५२०), गजपती मोहीम (उदयगिरी, कोंडाविडू, कटक), १४ लढाया जिंकणे, प्रशासन, साहित्य (अमुक्तमाल्यदा), पोर्तुगीज संबंध. त्यांचे व्यक्तिमत्त्व, योद्धा व राजा म्हणून विस्तृत वर्णन.
भाग ७

 

८.अंतिम काळ: रामराय, राक्षस-तंगडी (तालीकोटा) युद्ध (१५६५), पाच सुलतानांची युती, पराभव आणि साम्राज्याचा ऱ्हास.
भाग ८

 

 

विरुपाक्ष मंदिर, हंपी.

ज्याप्रमाणे नगर शहरात थोड्या उंचीवर गेलात तर कधी  सपाट जागेवरून ‘चांदबिबी महाल’ दिसतोच, तसेच हंपीतलं विरुपाक्ष मंदिरही शहरातून कुठूनही सहज दिसतं. माझी रूम जिथे होती, तिकडूनही उत्तरेकडे नीट ठराविक उंचीवरून विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसायचे. अगदी अंजनेरी पर्वतावरूनही हंपीचे गोपुर स्पष्ट दिसतात.

मंदिराच्या मुख्य गोपुरासमोर बाह्य प्रांगणात एक उंच आणि देखणा लाकडी रथ उभा होता. चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हा रथ बाहेर काढण्यात आला असावा.

विरुपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हम्पी (विजयनगर) येथील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शतकानुशतके हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. पंपापती म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या पंपा नदीची स्वामी किंवा पंपा-तीर्थाचा स्वामी. येथे तुंगभद्रा नदीला पंपा नदी म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर, हेमकूट डोंगराच्या उत्तरेला, अतिशय देखण्या निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.विरुपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ७व्या शतकात बदामी चालुक्य काळात झाली. सुरुवातीला हे एक छोटे शिवमंदिर होते, ज्यात विरुपाक्ष किंवा पंपापती लिंगाची स्थापना करण्यात आली होती. ९व्या आणि १०व्या शतकातील उपलब्ध शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आढळतो. १२व्या शतकात उत्तर चालुक्य काळात मंदिराचा लक्षणीय विस्तार झाला. याच काळातील पार्वती आणि भुवनेश्वरी ही दोन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांमधील काळ्या दगडाचे लेथ-टर्न केलेले सुंदर स्तंभ हे त्या काळाचे जिवंत साक्षी आहेत.म्हणजेच, विजयनगर साम्राज्य स्थापन होण्यापूर्वीच हे मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षे जुने होते.

१४व्या शतकापासून विजयनगर राजांनी या मंदिराला संरक्षण व संवर्धन दिले. देवराय दुसरा (१४२२–१४४६) यांच्या काळात मुख्य पूर्व गोपुर बांधण्यात आला. मात्र मंदिराचा सर्वात मोठा आणि वैभवशाली विस्तार कृष्णदेवराय (१५०९–१५२९) यांच्या काळात सुमारे १५१० मध्ये झाला. यावेळी रंगमंडप -महामंडप, आंतर गोपुर, अनेक उपमंदिरे, स्तंभयुक्त क्लॉइस्टर आणि इतर सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले. लक्कण दंडेश (कृष्णदेवरायाचे सेनापती) यांनी या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याचे मुख्य देवस्थान बनले.

 विरुपाक्ष मंदिराचा हा गोपुर उंचीने ५० मीटर आहे. त्याचे बाह्यरूप फ्रॅक्टल या गणितीय संकल्पनेतून तयार झाल्यासारखे दिसते (अर्थात ‘फ्रॅक्टल’ ही संकल्पना नंतर प्रसिद्ध झाली).

 

फ्रॅक्टल स्थापत्यशास्त्र

फ्रॅक्टल ही गणितीय संकल्पना आहे जी स्वसदृशता वर आधारित आहे. म्हणजे एका आकाराचा छोटा भाग संपूर्ण आकारासारखाच दिसतो. हे नमुने वेगवेगळ्या स्केलवर आकारमानांवर पुनरावृत्ती होतात. बेनॉइट मॅन्डेलब्रॉट यांनी १९७५ मध्ये या संकल्पनेला औपचारिक स्वरूप दिले. प्रकृतीत फ्रॅक्टल्स सर्वत्र दिसतात. झाडाची फांदी, हिमकण, ढग, समुद्रकिनारा, रक्तवाहिन्या इत्यादी.

स्थापत्यशास्त्रात फ्रॅक्टल्सचा वापर केल्यास इमारती ज्यात पुनरावृत्ती, स्केलिंग आणि स्वसदृशता यांचा समावेश असतो. यामुळे इमारत नैसर्गिक, जटिल पण सुसंगत वाटते. हे अनैच्छिक असू शकते ज्यात सौंदर्य किंवा संरचनात्मक कारणांसाठी फ्रॅक्टल रचना वापरली जाते. तर काही वेळा हे औपचारिक असते ज्यात आधुनिक काळात संगणकाच्या मदतीने डिझाइन केले जाते. उदाहरणार्थ फ्रँक लॉइड राइट यांच्या काही इमारती किंवा समकालीन आर्किटेक्चर यात मोडतात. फ्रॅक्टल डिझाइनमुळे इमारती अधिक बायोफिलिक निसर्गाशी जोडणारी होतात ज्यामुळे मानवी मनःशांती, एकाग्रता आणि कल्याण वाढते.

भारतीय हिंदू मंदिर वास्तुकला ही फ्रॅक्टल्सची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधीच भारतीय स्थापत्यकारांनी ही रचना वापरली होती. मंदिरांच्या शिखर किंवा गोपुरात मुख्य शिखराभोवती लहान शिखरे त्याभोवती आणखी लहान शिखरे अशी रिकर्सिव स्वसदृशता दिसते. यामागे प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिर हे ब्रह्मांडाचे सूक्ष्म प्रतिरूप आहे. पूर्णता प्रत्येक भागात प्रतिबिंबित होते हा हिंदू दर्शनाचा सिद्धांत फ्रॅक्टल संकल्पनेत स्पष्ट दिसतो.हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या आकारात जे आहे, ते लहान आकारातही तसेच असते. हीच गोष्ट फ्रॅक्टल गणितात “स्वसदृशता” म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी मंदिरांमधून अमलात आणले असावे का ?

विरुपाक्ष मंदिर हंपी याचे गोपुर हे फ्रॅक्टल रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य आकार त्रिकोणी असून वर चढताना नमुने पुनरावृत्ती होतात जे स्नोफ्लेक सारखे दिसतात. हे १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील बांधकाम आहे. याचप्रमाणे खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, मदुराई मंदिर आणि राणकपूर जैन मंदिर यांमध्येही फ्रॅक्टल रचना स्पष्टपणे दिसते.

इतर संस्कृतींमध्येही फ्रॅक्टल आर्किटेक्चर आढळते. आफ्रिकन गावे, घरं आणि कापड यांमध्ये स्केलिंग आणि रिकर्शनचे उत्कृष्ट नमुने आहेत ज्यांचा अभ्यास रोन एग्लॅश यांनी केला आहे. युरोपातील गॉथिक आणि बारोक कॅथेड्रल्स तसेच आधुनिक काळातील फ्रँक लॉइड राइट यांच्या ऑर्गेनिक आर्किटेक्चरमध्येही फ्रॅक्टल तत्त्वे आढळतात.

गोपुरातील स्वसदृशता म्हणजे मोठ्या आकारातील रचना लहान आकारात पुन्हा पुन्हा दिसणे. एकच नमुना वेगवेगळ्या आकारमानांवर पुनरावृत्ती होणे ही फ्रॅक्टलची मूलभूत वैशिष्ट्ये गोपुरांमध्ये स्पष्ट दिसून येते. विरुपाक्ष मंदिर हंपी याचे मुख्य राजगोपुर सुमारे पन्नास मीटर उंच आणि नऊ मजली आहे. यात स्वसदृशता अशी दिसते की संपूर्ण गोपुराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे आणि खालच्या मोठ्या स्तरांवरील रेषा कोन व नक्षी वरच्या लहान स्तरांवरही त्याच रूपात पुनरावृत्ती होतात. प्रत्येक मजला हा खालच्या मजल्याचा लहान प्रतिरूप असतो. वर चढताना प्रत्येक पातळीवर नमुने लहान होत जातात तरी संपूर्ण गोपुरासारखेच दिसतात. ही रचना रिकर्सिव स्वसदृशता दर्शवते. म्हणजे गोपुराचा एखादा छोटा भाग वेगळा केला तरी तो संपूर्ण गोपुरासारखाच भासतो. याचप्रमाणे खजुराहोच्या कंदरिया महादेव मंदिरात मुख्य शिखराभोवती असलेल्या लहान शिखरांमध्येही आणखी लहान शिखरे दिसतात. मदुराई मीनाक्षी मंदिरातील गोपुरांवर प्रत्येक स्तरावर मुख्य गोपुरासारखीच नक्षी, देवमूर्ती आणि छोट्या शिखरांची पुनरावृत्ती होते. हिंदू दर्शनानुसार, गोपुर हे मेरु पर्वताचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील पूर्णता प्रत्येक छोट्या भागात असते, हेच तत्त्व गोपुरातील स्वसदृशतेतून व्यक्त होते. “पूर्णमदः पूर्णमिदम्” -पूर्णातून पूर्ण निघते, तरी पूर्णच उरते या वेदान्तातील कल्पनेशी हे जुळते.

विरुपाक्ष मंदिराच्या गोपुरात ही स्वसदृशता इतकी स्पष्ट आहे की, फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी १५वे शतकात ती वापरली गेली होती?

 

या गोपुराच्या बाह्य भागावर अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. विशेषतः पहिल्या स्तरावर मैथुन शिल्पे स्पष्ट दिसतात. ही शिल्पे प्राचीन भारतीय परंपरेनुसार सृष्टीची सर्जनशीलता आणि जीवनचक्र दर्शवतात.

गोपुरावर विविध देवदेवतांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात आहेत. शिव, विष्णू, गणेश, नंदी, राम-लक्ष्मण-सीता यांसारख्या देवमूर्ती, पौराणिक कथांमधील दृश्ये, यक्ष-यक्षिणी, गंधर्व आणि इतर सैद्धांतिक आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर शिल्पांची रचना वेगळी असून, खालच्या स्तरांवर मानवी जीवन, प्रेम, सृष्टी आणि पौराणिक कथा यांचे दर्शन घडते, तर वरच्या स्तरांवर अधिक आध्यात्मिक आणि देवी-देवतांच्या रूपांचे चित्रण आहे.

एक सुंदर गजरा विकत घेऊन ,केसांत माळला ...चार पाच रील्स काढल्यावरच मंदिराकडे वळाले ,हे वेगळे सांगायला नको 😊

मंदिरात आत शिरताच तीन शिरे असणारा त्रिमुखी नंदी दिसतो. 

एका भिंतीवर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह म्हणजे  वराह (जंगली डुक्कर), तलवार, सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त कोरीव आकृतिबंध दिसतो .वराह चिन्हाची सुरुवात मूळ चालुक्य राजवंशात झाली. बादामी चालुक्य (६व्या ते ८व्या शतक) यांनी सर्वप्रथम वराह (विष्णूचा तिसरा अवतार) याला आपले कुलचिन्ह स्वीकारले. चालुक्य राजे विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी पृथ्वीला समुद्रातून वाचवणाऱ्या वराह अवताराला आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रतीक बनवले.

विजयनगर साम्राज्याने चालुक्य राजवंशाकडून हे चिन्ह आपल्या राजकीय चिन्ह म्हणून स्वीकारले. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३३६) हरिहर आणि बुक्का राय यांनी चालुक्यांच्या परंपरेचा वारसा चालू ठेवला. विशेषतः कृष्णदेवराय आणि त्यानंतरच्या राजांच्या काळात हे चिन्ह सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि साम्राज्याच्या वैभवाचे प्रमुख प्रतीक बनले.

चिन्हातील घटक आणि त्यांचा अर्थ-

हे चिन्ह सामान्यतः वराह, तलवार, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोजनात दाखवले जाते. वराह हे शक्ती, साहस, धर्मरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे. तलवार युद्धक्षमता, न्याय आणि साम्राज्य संरक्षण दर्शवते. तर सूर्य आणि चंद्र “आचंद्रार्क” (सूर्य-चंद्र अस्तित्वात असेपर्यंत) हे साम्राज्य टिकावे, असा शुभ आणि चिरंतन अर्थ देतात.

विरुपाक्ष प्रांगणात डावीकडे लक्ष्मी हत्तिणीचे दर्शन झाले. ती झुलत-झुलत लुसलुशीत हिरव्या चाऱ्यावर ताव मारत होती.🐘

समोरच्या मोठ्या प्रांगणात दोन मंडप आहेत . एक मोठा व एक छोटा. यांना फलपुजा मंडप/कल्याण मंडप/सभामंडप अशी अनेक नावे आहेत. यातील मोठ्या मंडपात जवळपास १०० खांब आहेत. या खांबांवर सिंह, कृष्ण, पौराणिक कथा इत्यादी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मी खूप वेळ इथे रेंगाळले . प्रत्येक खांबावर वादकांची शिल्पे ही खूपच वेगळी आणि रोचक आहेत. छोट्या मंडपात मधोमध एक शिळा आहे, जिला कुंपण घातले आहे व भोवती खांब आहेत.

पुढे गोपुराच्या आतल्या भागावर आणखी एक मोठे प्रांगण आहे. त्याच्या समोर प्रथम दीपमाळ, नंदीमंडप, मग मोकळी जागा आणि पुन्हा विरुपाक्ष मंदिराचे प्रसिद्ध रंगमंडप येते. त्यानंतर अंतराल (अंतःप्रकोष्ठ) आणि गर्भगृह. गर्भगृहात ‘पंपापती’ विरुपाक्ष म्हणजे शंकराचे पिंड आहे.

रंगमंडपात ८ खांब आहेत, जे ससा, बकरी, घोडा, मंगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अशा विविध प्राण्यांपासून बनवलेल्या व्यालकृती (याली) स्वरूपात आहेत. विजयनगर साम्राज्यात बाजार, कल्याण मंडप, सभा मंडप, वादक शिल्पे यांसारखे व्यालकृती खांब खूप प्रसिद्ध आहेत. 

विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपाच्या पायऱ्यांजवळ शिलालेखात कृष्णदेवराय यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो, ज्यामुळे त्यांना या मंदिराचे सर्वात मोठे संवर्धक आणि दाता मानले जाते. विशेषतः १५१० ईसाली (त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात) कोरलेल्या कन्नड भाषेतील शिलालेखात कृष्णदेवरायांनी विरुपाक्ष देवतेच्या नावाने मोठ्या प्रमाणात दान आणि बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यात त्यांनी रंगमंडप (महामंडप), आंतर गोपुर, मुख्य गोपुराची दुरुस्ती आणि इतर अनेक सजावटीचे काम पूर्ण केल्याचे नमूद आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी सिंगनायकनहळ्ळी या गावाचे दान दिले, तसेच सोन्याचे ताट, सोन्याचे आणि चांदीचे दिवे, अमृतपदीसाठी जमीन आणि उत्पन्नाची व्यवस्था केली.

 

यापुढे तिन्ही बाजूंनी ओसरी आहेत. त्यात एक भव्य दगडी रांजण दिसले, ज्यात पंचामृत करून प्रसाद तयार केला जात असे.त्याशेजारीच एक मीटर रुंद अशी दगडी चूल दिसली, जी चंदन उगाळण्यासाठी वापरली जाते असे समजले.

हम्पीतील विरुपाक्ष मंदिर हे विजयनगर चित्रकलेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रंगमंडपाच्या छतावर ही चित्रे काढली आहेत. ही हम्पीतील एकमेव जिवंत विजयनगर चित्रे मानली जातात. यातील प्रमुख विषय म्हणजे विदुरण्य महर्षींची मिरवणूक, अर्जुनाने मत्स्ययंत्र भेदून द्रौपदीचा स्वयंवर, दशावतार, शिव-कामदहन, त्रिपुरारी, कल्याणसुंदरम (शिव-पार्वती विवाह) आणि गिरिजाकल्याणम (पंपा-विरुपाक्ष विवाह) यांसारख्या पौराणिक घटना आहेत. ही चित्रे १६व्या शतकातील आहेत आणि विजयनगर चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात.विजयनगर चित्रकलेचा नंतरच्या काळात मैसूर आणि तंजावर चित्रकला शैलींवर मोठा प्रभाव पडला

मी आपली मन लावून चित्र पाहत असताना एका मर्कटाने चपळाईने माझ्या केसांतील गजरा जोरात ओढला आणि निवांत खात बसला ,कोणाच्या हातातला प्रसाद ,पेय घे अशा मर्कट लीला मंदिरात सतत सुरु होत्या.तर अनेक कुटुंब वत्सल मर्कट कुटुंबही दिसले.ज्यात आई माकडिणीला पिल्लु माकड चिकटले आहे आणि वडिल माकड त्या पिल्लाला प्रेमाने गोंजारत आहेत. हे पाहुन हेच आपले पुर्वज असतील हे नक्किच पटले.🤩🐒

पंपा-भुवनेश्वरी देवीचे मंदिर विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ, उत्तरेकडील शांत कॉरिडोरमध्ये विराजमान आहे. या प्राचीन मंदिरात पाऊल टाकताच सुंदर अलंकार-वस्त्रांनी सजलेली देवीची मूर्ती पाहून मन एक वेगळ्याच भक्तीभावाने भरून जाते. १२व्या शतकातील चालुक्य शैलीतील हे छोटेसे मंदिर इतके सुंदर आणि पवित्र आहे की, येथे उभे राहिल्यावर आपण इतिहासाच्या काळात हरवल्यासारखे वाटते. याच ठिकाणी हम्पीच्या महान सम्राटांची संपूर्ण वंशावळ दगडावर इंग्रजीत रंगविली आहे .जी वाचताना  जणू हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाने आपल्याशी बोलत आहे असे वाटले.चार बाजूला स्तंभयुक्त क्लॉइस्टर भोवती फिरणारा मंडप-ओसरीवजा मार्गक्रमण भाग आहे.

मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात काही पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटी, रहस्यमय आणि अंधारी खोली आहे. त्या खोलीत प्रवेश करताच मनात एक अपूर्व कौतुक आणि आश्चर्य जागे होते. खोलीच्या पूर्व भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून बाहेरच्या भव्य ५२ मीटर उंच पूर्व गोपुराची उलटी प्रतिमा भिंतीवर स्पष्ट दिसते. प्राचीन काळातील हे पिनहोल कॅमेरा तंत्र पाहून,ही  किती अद्भुत कला होती. त्या काळातील भारतीयांचे विज्ञान आणि कलेचा हा संगम आहे .🙏

 

पिनहोल कॅमेरा हा जगातील सर्वात सोपा आणि प्राचीन कॅमेरा आहे. यात कोणतीही लेन्स (काच) वापरली जात नाही. फक्त एका अंधार्‍या खोलीत भिंतीवर एक अत्यंत छोटे छिद्र (pinhole) केले जाते. या छोट्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत येतो आणि भिंतीवर उलटी प्रतिमा तयार होते.हे तंत्र “Camera Obscura” नावाने ओळखले जाते.

प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, ही मूलभूत भौतिकशास्त्रीय सत्यता विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा तंत्रामागील मुख्य रहस्य आहे. जेव्हा बाहेरचा तेजस्वी प्रकाश त्या छोट्याशा छिद्रातून आत येतो, तेव्हा प्रकाश किरण एकमेकांत मिसळत नाहीत किंवा एकत्र होत नाहीत. प्रत्येक किरण सरळ मार्गाने आत शिरतो आणि विरुद्ध भिंतीवर आपली छाप सोडतो. यामुळे बाहेरच्या गोपुराची प्रतिमा पूर्णपणे उलटी तयार होते .वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे दिसतो.

मंदिराच्या उत्तरेकडील दाराने बाहेर पडताच, समोर एक पवित्र पुष्करणी दिसते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली होती, तरीही त्या ठिकाणचे शांत आणि पवित्र वातावरण मनाला मोहिनी घालते. हम्पी मंदिरासमोरून पुन्हा जाताना आम्ही हेमकूट टेकडी चढण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल उचलताना हृदयात एक वेगळाच रोमांच जाणवत होता .

मंदिराबाहेरील लाकडी रथ
मंदिराबाहेरील लाकडी रथ 

 

 फलपुजा मन्दिरातील खांबावरील वादक व सुरसुंदरी

१
3
कन्न्ड मधील शिलालेख
कन्नडमधील शिलालेख 
आकर्षक व्यालखांब
आकर्षक व्यालखांब  

 

नक्षीदार खांब
नक्षीदार खांब 

 

रंगमंडप छतावरील रंगीत छायाचित्रे (यात दशावतार दिसत आहेत)फोटो आंतरजाल 
दगडी रांजण
पिनहोल कॅमेराद्वारे गोपुर उलटी प्रतिमा 

हो त्या दिवशी संध्याकाळीही विविध रंगांनी सजलेल्या आकाशात विरुपाक्षचा गोपुरही पाहिला.त्या आकाशात तो शोभत होता तर त्या सर्वोच्च टोकावर चन्द्र्कोर विराजमान झाली होती..जणु पंपावती शंकराचेच हे रुप!!!😇



विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर आहे. हंपीतून कुठूनही त्याचे रायगोपूर आभाळात उठावलेले दिसते.  फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत. पंपा भुवनेश्वरी मंदिरात तर एकदम प्राचीन मंदिरात आल्यासारखे वाटते. 

तुमच्या लेखामुळे माझ्या विरुपाक्ष दर्शनाची आठवण आली. 


फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत.

अच्छा 👍

कन्नप्पा नयनार खुप शोधला पण सापडलाच नाही. मी कोणाला तरी विचारायला पाहिजे होते.

कन्नप्पा नयनार अंतराळातील स्तंभावर आहे. केवळ विरुपाक्ष मंदिरातच इतकी शिल्पे आहेत की अगदी साताठ फेऱ्यांतही काहीतरी पाहणे राहून जावे.


देवळे पाडली नाहीत पण देव फोडले, विरुपाक्ष आणि आणि २/३ लहान देवळे वगळता एकाही देवळात गाभाऱ्यात मूर्ती नाही. अच्युतराय, विजय विठ्ठल, बाळकृष्ण, हजारराम, सरस्वती, चंद्रशेखर एकही लिव्हिंग टेम्पल नाही.


 

पण त्यातील देवळे पाडली नाहीत. राजवाडे पाडले, संपत्ती पळवली.

हे लिहायचे राहिले. नुकतीच एके ठिकाणी याबद्दल माहिती वाचली. फक्त विरूपाक्ष मंदिरात पूजा होते इतरत्र कोणत्याच मंदिरात होतं नाही कारण तिथल्या मूर्ती बहामनीन्नी फोडून भग्न केल्या आहेत.बडवेलिंग येथेही पूजा होते.

*****

हंपीतील बहुतेक मंदिरात मुख्य मूर्ती नाहीच, आणि आहेत त्या भंग केलेल्या....
चौदाव्या शतकात बहामनी सुलतानाने विजयनगर वर आक्रमण केले आणि त्यात त्याला थोडं फार यश आल्यावर भारतातील चारी -पाची मुस्लिम राजवटींनी हंपी अर्थात विजयनगर च्या साम्राज्यावर हल्ला केला. हल्ल्याचा मूळ उद्देश हा हंपीत असणार धन हा होता. 
पण येणार सुलतानी आक्रमण एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन येते. त्यातून हंपीतील अनेक मंदिराची तोडफोड झाली, मुर्ती  भंग केल्या गेल्या.

पण त्यातून देखील जे दोन तीन मंदिर वाचले त्यातील प्रमुख म्हणजे "वीरूपाक्ष मंदिर " जे शिवाचे मंदिर आहे.
त्याची कथा स्थानिक लोक सांगतात की, मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर व बऱ्याच ठिकाणी विजयनगर च्या साम्राज्याचे राजचिन्ह कोरलेले आहे. ज्यात वराह (डुक्कर ),तलवार, चंद्र - सूर्य आहे. हे चिन्ह हंपीत बऱ्याच ठिकाणी दिसेल.

पण ह्या चिन्हात डुक्कर (वराह ) असल्याने ह्या मुस्लिम सैन्याला ते मंदिर तोडता आले नाही. कारण मुस्लिम डुकराला सगळ्यात अपवित्र मानतात, ते त्याच नाव देखील घेत नाहीत.

 

----- TEAM INDIAN HERITAGE PANDA 

खखोदेजा.


बडवीलिंग,  यंत्रोद्धारक हनुमान मंदिर, उड्डाण वीरभद्र मंदिर ह्यात आजही पूजाअर्चा चालू असते.

तसेच बहमनीच्या शकले झालेल्या पाच सुलतानांच्या नासधुशीत ह्या मंदिरांच्या शिल्पांचे फारसे नुकसान झाले नाही (फक्त गर्भगृहातील मुख्य देवता नष्ट झाल्या) ह्याचे कारण म्हणजे ह्या दख्खनी सुलतानांच्या सैन्यात बरेच हिंदू सरदार होते. मूर्तींची नासधूस सर्वच शाह्यांच्या काळात झाली मात्र सुरुवातीची गझनवी, खिलजी, घोरी, आणि मुघलांच्या बाबर आणि औरंगजेब ह्या राजवटी सर्वात असहिष्णु होत्या असे म्हणता यावे, औरंगजेब तर सर्वाथाने बुतशिकन होता.


हंपीत फिरायचे कसे??
मला खूप निवांतपणे, माझ्या सोयीनुसार प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी रूमपासून विरुपाक्ष मंदिरापर्यंत रिक्षा केली (१५० रुपये, बार्गेनिंग केले). पहिल्या दिवशी मी जवळपास १० किलोमीटर पायी फिरले. फक्त एका लांबच्या ठिकाणी रिक्षा घेतली.
पूर्ण दिवस रिक्षा टुरिझम १५००-२००० रुपये प्रतिदिवस असते. ज्यांना अजिबात चालायचे नसेल त्यांनी रिक्षाच करावी. दुसऱ्या दिवशी १००० आणि तिसऱ्या दिवशी १२०० रुपये असे माझे रिक्षा खर्च झाले.
पर्याय
हंपीत ८०० रुपये प्रतिदिवस टू-व्हीलर (स्कूटर/बाइक) रेंटने मिळते. २००-४०० पर्यंत सायकलही मिळते. (सध्याच्या दरानुसार स्कूटर ४००-९०० रुपये पर्यंत असू शकते, बार्गेनिंग करा.)

***
हंपी पाहायचे कसे??
हंपीला जाण्याआधी मी पूर्ण एक आठवडा विजयनगर साम्राज्याविषयी वाचन आणि व्हिडिओ पाहिले. जयंत कुलकर्णी यांच्या लेखांचा, सागर बोरकर 
" उनाडक्या: हंपी: दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार - भाग ३ https://share.google/L3HFbci3Aq3iXZmL5 "
यांच्या हंपी ब्लॉगचा खूप फायदा झाला. केतन पुरी आणि आशुतोष बापट यांचे यूट्यूब व्हिडिओ ऐकले. आशुतोष बापट यांचे हंपीवरचे पुस्तकही विकत घेतले.

***
पोटोबाचा कसा करायचा
सकाळी भरपेट नाश्ता-ब्रंच (इडली, डोसा, उत्तपा, वडा) करायची सवय ठेवा. थेट सायंकाळी ५-६ ला जेवण. दरम्यान ज्यूस, रस, आयस्क्रीम, फळे आणि भरपूर पाणी — हायड्रेटेड राहा. (उन्हाळ्यात ४०°C+ तापमान असू शकते, म्हणून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घ्या.)

***
पहिल्या दिवशी
विरुपाक्ष मंदिर आणि त्याच्या परिसरातील हेमकूट पर्वत, दोन गणेश मंदिरे, कृष्ण मंदिर, लक्ष्मी नरसिंह, कोंदडराम अच्युतराय मंदिर आणि सूर्यास्त मातंग टेकडीवरून पाहायचा.
***
दुसऱ्या दिवशी
विजयविठ्ठल मंदिर, जुना राजवाडा परिसर, प्रसन्न विरुपाक्ष, म्युझियम, कोरॅकल राईड आणि सूर्यास्त तुंगभद्रा किनारी किंवा हेमकूट पर्वतावर.
****
तिसऱ्या दिवशी
अंजनेरी पर्वत, पम्पा सरोवर, शबरी गुहा, अनगुंडी किल्ला पाहायचे.
अतिरिक्त टिप्स

बार्गेनिंग सर्व ठिकाणी करा,राहणे, रिक्षा, टू-व्हीलर, सर्व काहीत.😅
उन्हाळ्यात गर्दी कमी असते, त्यामुळे चांगले डील आणि शांत अनुभव मिळतो.
सकाळी लवकर बाहेर पडा आणि दुपारी सावकाश विश्रांती घेत फिरा.
चांगले चालण्याचे शूज, सनस्क्रीन, टोपी आणि रिचार्जेबल पॉवर बँक घ्या.
मोबाईल नेटवर्क काही ठिकाणी कमकुवत असू शकते.


हंपीच्या जोडीने बदामी-पट्टदकल-ऐहोळे ही करावेचं असे आहे, भेट देण्यास हिवाळा ऋतू सर्वोत्तम. बदामीवरून सुरवात करून, पट्टदकल-ऐहोळे व शेवटी हंपी करणे श्रेयस्कर. स्वतःचे वाहन वापरणे अत्यंत सोयीचे व प्रवास कालावधी वाचवणारे, स्वतःचे वाहन असल्यास, दीड दिवस बदामी (लेणी, किल्ला आणि भूतनाथ मंदीर समूह-अगस्त्य तलाव परिसर), दीड दिवस पट्टदकल+ऐहोळे मिळुन व हंपी तीन वा चार दिवस अशी विभागणी सर्वसामान्य पर्यटकांसाठी पुरेशी ठरावी. अभ्यासु, संशोधक वृत्तीच्या लोकांसाठी तर कितीही दिवस कमी पडावेत असा परिसर आहे. 


सकाळी सहाला ही ठिकाणे उघडतात व त्यावेळी गर्दी अजिबात नसते व लगतच्या दाट मानवी वस्तीचा उपसर्ग ही मर्यादित असतो, त्यामुळे सकाळची ही वेळ गाठता आली तर अनुभव अजूनचं सुंदर होतो, तांबूस दगडी टेकड्यांवर कोवळी उन्हे उतरताना पाहणे 'खास' असते.  

 

या सर्व ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक(Guide) घेण्याविषयी तडजोड अजिबात करू नये, सर्वसामान्य पर्यटकांसाठी मार्गदर्शकाशिवाय ही ठिकाणे पाहणे मुर्खपणा ठरेल इतके ते महत्त्वाचे आहे, शिवाय स्वतःचे वाहन असले तरी भरपूर चालायची तयारी असणे गरजेचे.... 


होस्पेटमधील प्राणी संग्रहालय आणि तुंगभद्रा धरणाच्या केंद्रीय जल निगमच्या ताब्यातील भागातून संध्याकाळच्या वेळी धरण परिसराची सफर हा अनुभवही नक्की घ्यावा असा आहे, जल निगमच्या एखाद्या कर्मचाऱ्याची ओळख असेल तर खाजगी वाहन थेट वर गेस्ट हाऊसपर्यंत नेता येते व धरणाच्या भिंतीवर ही सहज प्रवेश मिळू शकतो, तिथल्या विस्तीर्ण जलाशयाच्या पार्श्वभुमीवरचा कातरवेळेचा अनुभव 'दुर्मिळ' असा ठरावा...


कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.
मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.इ..स. १५१३ च्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, या मोठ्या आणि सुशोभित, पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) येथून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीने केली होती. पंचायतन शैलीत दोन आवारांसह बांधलेल्या या मंदिर संकुलात गर्भगृहासह मुख्य मंदिर, एक प्रवेशकक्ष, स्तंभयुक्त मंडप आणि सभागृहे, एक देवी मंदिर आणि अनेक उप-मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य मंदिराच्या आग्नेय दिशेला एक स्वयंपाकघर आणि नैऋत्येकडील पहिल्या आवारात एक स्वतंत्र भांडार आहे. भव्य मनोरा असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार हे विजयनगर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान कृष्णाची पौराणिक कथा असलेल्या भागवताचे आणि त्या काळातील जीवनाचे चित्रण कोरलेले आहे. महामंडपाच्या स्तंभांवर भगवान विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते. मंदिराच्या आवारात स्थापित केलेल्या एका मोठ्या शिलालेखावर या मंदिराची कथा आणि विजयाची कहाणी कोरलेली आहे.

आत शिरलो तर दोन्ही भिंतींवर कोरलेली शिल्पे दिसली अगदी वरपर्यंत साधारण १२- १५ फूटापर्यंत हे कोरीव शिल्पे होती.मी यापूर्वी कृष्णमंदिरातील शिल्पाविषयी एक व्हिडियो पाहिला होता.त्यानुसार यावरील विष्णूचे दशावतार शोधू लागले .अगदी पायथ्याशी लतासुंदरीचे आखीव शिल्प आणि त्या तिने हातात धरलेल्या लता -वेली वरपर्यंत गेल्या आहेत आणि त्यावर गोलात हे दशावतार कोरलेले आहेत.

लतासुंदरी

 

 

 

 

अगदी वर पाहिल्यावर या द्वाराच्या छतावर एक अनोखे कोरीवकाम आहे-चंद्रग्रहणाचे दृश्य.!त्यात चंद्रातील ससा आणि त्याच्याकडे सरकत येणारे राहू-केतू स्वरूपातील दोन सर्प दाखवले आहेत. हे चंद्रग्रहणाच्या पौराणिक कल्पनेचे कलात्मक चित्रण मानले जाते.या शिल्पात राहू हा सर्पाकार अथवा राक्षसी आकृतीच्या स्वरूपात दाखवला असून तो चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
भारतीय पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहूचे डोके भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने छाटले. मात्र अमृत पिल्यामुळे तो अमर झाला. तेव्हापासून सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून राहू वेळोवेळी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. सूर्य किंवा चंद्र काही काळ झाकले गेले की ग्रहण होते, अशी लोकमान्यता होती.ही कथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही तर  ती सामान्य जनतेला आकाशातील घटनांचे स्पष्टीकरण देणारी लोकप्रिय आख्यायिका होती. त्यामुळे मंदिरातील शिल्पकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटनेलाही कलात्मक रूप दिले.

समोर असणारे भव्य प्रांगण आणि मुख्य मंदिर आणि उपमंदिरांचे आकर्षक छोटी छोटी कलात्मक शिखरे पाहून मी थक्क झाले.अशी तीन उपमंदिरे या मंदिराच्या प्रांगणात आहेत.

 

आता बाहेर पडतांना लक्ष समोरच्या गोपुराच्या शिल्पाकडे जाते .गुलाबी-लालसर रंगाचे हे काम अतिशय मोहक आहे,परंतु हवामान, वर्षाव आणि जीर्णता यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, तरीही उरलेले भाग अद्भुत आहेत.त्यामुळेच ASI कडून तिथे डागडुजीचे  काम सुरु असून अनेक रॉड लावले होते .कृष्ण मंदिराच्या गोपुरावर मूळत विष्णूचे विविध अवतार,कृष्णलीला,देव-देवता,गंधर्व,अप्सरा.याली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'युद्धप्रसंग' दाखवले आहे .
ही शिल्पे स्टुको (stuscco)शिल्पे आहेत.स्टुको ही चुनखडी, वाळू, गूळ, वनस्पतीजन्य घटक, शंखचूर्ण आणि कधी कधी अंड्याचा बलक किंवा इतर बांधणीकारक पदार्थ यांचे मिश्रण करून तयार केलेली सजावटीची कलाशैली आहे. या मिश्रणापासून मूर्ती, नक्षीकाम, देव-देवतांच्या आकृती आणि वास्तूवरील अलंकार घडवले जातात.दगड कोरून शिल्प तयार करण्याऐवजी स्टुकोमध्ये ओल्या मिश्रणाला आकार देऊन आकृती तयार केली जाते. नंतर ते वाळल्यावर त्यावर रंगकामही केले जात असे.
 

हे वरील छायाचित्र tales of gaurav या चॅनेलच्या सौजन्याने.

 

 

हे शिल्प दृश्य कृष्णदेवरायांच्या १५१२-१५१३ च्या कालिंग/उदयगिरी/ओडिशा मोहिमेतील विजय दर्शवते. त्यांनी गजपती राजा प्रतापरुद्रावर विजय मिळवला.हे शिल्पे त्या विजयाचे स्मारक आहेत.काही संशोधकांना हे फक्त "विजय" नव्हे तर युद्धातील हानी आणि मानवी भावनाही दाखवतात असे वाटते . उदाहरणार्थ, सैनिकांच्या चेहऱ्यांवरील विविध भाव.
हा लेख नक्की वाचा,हा युद्ध प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन आहे .
https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding…

या युद्धप्रसंगात योद्धे ढाली घेऊन.घोडे काही जोमदार, काही राजाच्या समोर,हत्ती युद्धरथ किंवा सैन्याच्या रांगेत(हे मला ओळखता आले नाही)
सैन्याची रचना, राजा कृष्णदेवराय  एका घोड्यावर स्वार दिसत आहेत,काही वर्णनांनुसार गंभीर चेहऱ्याने दिसत आहे. सैनिकांच्या चेहऱ्यावरील भाव काही हसरे, काही गंभीर किंवा दुखी दिसत आहेत.युद्धातील हालचाल, पडलेले सैनिक इत्यादी दाखविले आहे .व दुसऱ्या बाजूला गोपुरावर भगवान कृष्णाच्या लीला  संबंधित शिल्प आहेत.

 

आता आम्ही बाहेर पडलो.मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते.हा खरं तर मुख्य रस्ता -सपाट असा -रथांचा रस्ता होता, जो एकेकाळी 'कृष्ण बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याबाजाराकडे जात असे. अनेक मंडपात बाजारातील दुकाने होती.

 

लक्ष्मी नरसिंह


कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला,२०० ते ३०० मीटर अंतरावर विशाल एकाश्म नरसिंह मूर्ती आहे. दक्षिण भारतात  नरसिंह पूजा खूप प्रचलित आहे.हंपीतील ही मूर्ती त्या परंपरेचे एक प्रमुख उदाहरण आहे.ही मूर्ती कृष्णदेवराय १५२८ ई. यांच्या काळात, कृष्णभट्ट या शिल्पकाराने एकाच दगडातून घडवली. विजयनगर साम्राज्याच्या शिखर काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. कृष्णदेवराय वैष्णव भक्त होते आणि नरसिंह हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.मूर्ती सुमारे २२ फूट उंच असून ती एका अखंड ग्रॅनाइट शिळेतून घडवण्यात आली आहे.

विशेषतः होयसळ आणि विजयनगर स्थापत्यामध्ये उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह ही रूपे प्रामुख्याने दिसून येतात.

१. उग्र नरसिंह 
उग्र नरसिंह हे विष्णूच्या क्रोध आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या रूपात नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना दाखवला जातो. सिंहमुख, मोठे गोल डोळे, बाहेर आलेले दात, फुगलेल्या आयाळीचे केस आणि अनेक हातांत शस्त्रे अशी त्याची वैशिष्ट्ये असतात.
बहुतेक मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, द्वारशाखांवर किंवा मंडपातील शिल्पपट्टिकांमध्ये हे रूप कोरलेले आढळते. यामागील संकल्पना अशी की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांचे आणि देवालयाचे संरक्षण करणारा उग्र देव बाह्य भागात असावा.

२. योग नरसिंह
योग नरसिंह हे पूर्णतः वेगळे आणि शांत स्वरूप आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर क्रोध शांत होऊन नरसिंह योगध्यानात स्थिरावला आहे, अशी या रूपामागील कल्पना आहे.या मूर्तीमध्ये पद्मासन किंवा योगासन,गुडघ्यांभोवती योगपट्टा,ध्यानस्थ मुद्रा,प्रसन्न किंवा गंभीर मुखमुद्रा अशी वैशिष्ट्ये दिसतात.
होयसळ स्थापत्यातील अनेक नरसिंह मंदिरांच्या गर्भगृहात योग नरसिंहाची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. भक्तांना भय नव्हे तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देणे हा यामागील उद्देश असावा.

३. लक्ष्मी नरसिंह
हे नरसिंहाचे सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तिपर स्वरूप आहे. या रूपात लक्ष्मी देवी नरसिंहाच्या मांडीवर किंवा शेजारी बसलेली असते.लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे उग्रतेचे रूपांतर करुणा आणि संरक्षणात होते. त्यामुळे ही प्रतिमा शक्ती आणि सौम्यता यांचा सुंदर समन्वय दर्शवते.

हंपीतील नरसिंह कोणत्या प्रकारचा?

लक्ष्मी नरसिंह ह्या हंपीतल्या मूर्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ती 'उग्र नरसिंह' म्हणून प्रसिद्ध असली तरी ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी पारंपरिक उग्र नरसिंह प्रतिमा नाही. त्या मूर्तीमध्ये राक्षस नाही, युद्धदृश्य नाही आणि वधप्रसंगही दाखवलेला नाही.

मूळतः ती लक्ष्मी नरसिंह प्रतिमा होती. नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती. कालांतराने ताळिकोटच्या युद्धानंतर झालेल्या विध्वंसात लक्ष्मीचा बहुतांश भाग तुटून गेला.यामुळे मूर्तीचे मूळ सौम्य रूप हरवले आणि आज ती अधिक उग्र वाटते.  लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाल्यामुळे आज केवळ विशाल सिंहमुखी नरसिंह दिसतो आणि त्याच्या तीव्र मुखमुद्रेमुळे त्याला "उग्र नरसिंह" म्हणण्याची प्रथा पडली.म्हणून शिल्पशास्त्रीय दृष्टीने हंपीची मूर्ती लक्ष्मी नरसिंह आहे, तर लोकप्रिय पर्यटनपर भाषेत ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. हा फरक समजून घेणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.
यात अजून एक भर पडली ती ही मूर्ती योग नरसिंहही  आता भासते.हंपीतील लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा योग पट्टा हा मूर्तीच्या सर्वात चर्चित आणि लक्षात येणारा भाग आहे.योग पट्टा हा योगासनातील स्थिरतेसाठी वापरला जाणारा पट्टा आहे. तो गुडघ्याभोवती किंवा पायांना बांधला जातो, जेणेकरून दीर्घकाळ ध्यान/योग मुद्रेत बसता येते.ही मूर्ती क्रॉस-लेग्ड (पद्मासनासारखी) योग मुद्रा मध्ये आहे. पाय ओलांडलेले, हात गुडघ्यांवर आणि गुडघे एकत्र धरलेले दिसतात.१९८० च्या दशकात ASI ने जीर्णोद्धार केला.नवीन गुडघे आणि दगडी योग पट्टा जोडला गेला. हा पट्टा गुडघ्यांना एकत्र बांधतो.
यामुळे मूर्ती आता योग नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखली जाते. काहीजण या जीर्णोद्धाराला वादग्रस्त मानतात, कारण मूळ उग्र रूप बदलले गेले.


परंतु या एकाच मूर्तीने तिन्ही उग्र,योग,लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणे खरंच खूप अद्भुत योगायोगच म्हणावे लागेल :)
नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार जो मानवी शरीर + सिंहमुख दर्शवतो.जिथे मानव = बुद्धी ,सिंह = शक्ती म्हणजेच शक्ती आणि विवेक यांचा समतोल सृष्टीत दाखवतात .मूर्ती पाहताक्षणी सर्वांत प्रथम लक्षात येतात बाहेर आलेले  डोळे आणि उग्र चेहरा. सिंहाचे केस, तीक्ष्ण दात आणि भयावह अभिव्यक्तीमुळे तिला उग्र नरसिंह म्हणून ओळखले जाते. पण त्याच वेळी ती योगासनात बसलेली आहे. गुडघ्याभोवती योग पट्टा (बांधलेला, जो दीर्घकाळ ध्यानस्थ राहण्यासाठी वापरला जातो.
मूर्ती अदिशेषनागाच्या तीन वळणांवर बसलेली आहे. शेषनागाचे सात फणे  डोक्यावर उभे राहून एक दिव्य छत्र तयार करतात.भारतीय तत्त्वज्ञानात शेष म्हणजे अनंत काळ,विश्वाचे आधारतत्त्व,ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून ही मूर्ती केवळ देवप्रतिमा नसून "विश्वरक्षक" संकल्पना दर्शवते .मूळतः नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीदेवी बसलेल्या होत्या आता केवळ तिचा एक हात कंबरेभोवती दिसतो. हात, अलंकार आणि लक्ष्मीची पूर्ण आकृती १५६५ च्या तालीकोटा युद्धानंतरच्या आक्रमणात नष्ट झाली, तरीही ही मूर्ती आजही उभी आहे जणू इतिहासाला आव्हान देत!
जर तुम्हाला आवारात आत जाण्याची संधी मिळाली (मला मिळाली नाही,मूर्ती सामान्यांसाठी कारणपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे ), तर तुम्हाला देवीचा हात विष्णूच्या पाठीवर आलिंगन अवस्थेत विसावलेला दिसतो,असे सांगितले जाते .

बदवीलिंग 


नरसिंहापासून काही पावलांवरच शेजारीच बदवीलिंग आहे.हे हंपीतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे-सुमारे ३ मीटर (९-१० फूट) उंच!!
एकाच दगडातून कोरलेले ह्या लिंगावर तीन डोळ्यांची नक्षी स्पष्ट दिसते.मंदिराचे गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.ह्या शिवलिंगाचा पाया २ ते ३ फूट 
सतत पाण्यात  राहते. तुंगभद्रा नदीतून एक छोटी कॅनॉल ने पाणी मंदिरात आणले जाते, ज्यामुळे वर्षभर पाणी आटत नाही. गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.पूजा करणारे भक्त किंवा पुजारी पाण्यात चालत लिंगाजवळ जातात.

"बदवी" किंवा "बडाव" म्हणजे कन्नड भाषेत गरिब किंवा दरिद्री असा होतो.
कथेनुसार, हे लिंग एक गरिब शेतकरी स्त्री  ने आपल्या भक्तिभावाने बनवले किंवा बनवण्यास प्रेरणा/अर्थ साहाय्य दिले. तिच्या साध्या-सोप्या श्रद्धेमुळे हे नाव पडले. ही कथा हंपीच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

नरसिंह आणि बदवीलिंग शेजारीच का?हा प्रश्न अनेक संशोधकांना पडतो.वैष्णव आणि शैव परंपरा अनेकदा वेगळ्या मानल्या जातात.परंतु विजयनगरमध्ये दोन्ही परंपरांना समान महत्त्व होते.त्यामुळे नरसिंह  'विष्णू' आणि बदवीलिंग 'शिव' या दोन प्रतिमा एकत्र उभ्या राहून धार्मिक समन्वय दर्शवतात.

पुढच्या ठिकाणाकडे आता चालू लागलो -प्रसन्न विरुपाक्ष मंदिराकडे ...रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळीच्या बागा होत्या ,त्यामुळे चालायला मजा येत होती .पण नंतर लक्षात आले कि मंदिराकडचे अंतर खूप आहे ,तेव्हा रिक्षा करून तिकडे गेलो.

 

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात रहस्यमय आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. याला सामान्यतः भूमिगत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर विजयनगर काळात बांधले गेले असून, जमिनीच्या पातळीपेक्षा काही मीटर खाली स्थित आहे. मंदिराकडे जाताना अनेक पायऱ्या उतरत खाली जावे लागते .मग चारी बाजुंना चिरेबंदी दगडांसारखे दगड वापरून भिंती बांधल्या आहेत .यामुळे हे ठिकाण अजूनच गूढ वाटते.

आजच्या जमिनीच्या पातळीवरून पाहिले तर मंदिराचे छप्पर जवळजवळ जमिनीच्या समांतर दिसते, परंतु मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह खालच्या स्तरावर आहेत. यामुळे संपूर्ण मंदिर जमिनीत दडलेले असल्याचा भास होतो, म्हणूनच त्याला भूमिगत मंदिर म्हणतात.
या मंदिराचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाणी. गर्भगृह आणि आतील भाग वर्षभर पाण्याने वेढलेले असतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखी वाढते. काही संशोधकांच्या मते हे पाणी तुंगभद्रा नदीशी जोडलेल्या जलमार्गांमुळे येत असावे, मात्र याचे नेमके कारण आजही निश्चितपणे ज्ञात नाही. पाण्यात बुडालेले असलेले शिवलिंगाचे दर्शन येथे खास अनुभवास येते.
हे मंदिर विजयनगर स्थापत्यशैलीचे असले तरी हंपीतील इतर भव्य मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे साधे दगडी स्तंभ, अलंकरणाचा कमीतकमी वापर, प्रशस्त महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधी आणि प्रभावी रचना दिसते. हजारराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम येथे आढळत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी वापरले जात असावे.
या मंदिराबाबत एक रोचक बाब म्हणजे ते जवळजवळ चारशे वर्षे माती आणि गाळाखाली पूर्णपणे झाकले गेले होते. १९८० च्या दशकात उत्खनन आणि संवर्धनाच्या कामांदरम्यान ते पुन्हा प्रकाशात आले.
प्रसन्न विरुपाक्ष नावाचे विशेष महत्त्व आहे. हंपीतील मुख्य विरुपाक्ष मंदिर हे भव्य सार्वजनिक तीर्थक्षेत्र आहे, तर हे भूमिगत मंदिर शिवाच्या प्रसन्न, शांत आणि कृपाळू स्वरूपाला समर्पित मानले जाते.
आता आम्ही पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराकडे निघालो ....

-भक्ती





























राजस्थान ट्रिप

  तयारी, भाग १ लेखक जेडी यांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले. राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची...