Tuesday, February 23, 2021

बनेश्वर : रमणीय परिसर

 निसर्गाच्या सानिध्यात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस घालवायचा असल्यास चांगला पर्याय आहे तो बनेश्वरचा.महादेवाचे अत्यंत देखणे मंदिर पाहण्याबरोबर या ठिकाणचा धबधबाही मन मोहून टाकतो.

लॉकडाउननंतर आता सर्व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला लागली आहे. त्यामुळे सर्वांची पावले कोणत्या न् कोणत्या पर्यटनस्थळाकडे वळायला लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस घालवायचा असल्यास चांगला पर्याय आहे तो बनेश्वरचा. महादेवाचे अत्यंत देखणे मंदिर पाहण्याबरोबर या ठिकाणचा धबधबाही मन मोहून टाकतो. 

बनेश्वर  पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुण्यापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्यच आहे. बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये केली. त्यावेळी मंदिरास उभारणीस एकूण खर्च ११,४२६ रुपये आला. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. या घंटेवर १६८३ असे वर्ष असे कोरले असून, त्यावर एक क्रॉस आहे. 

मंदिरात आत गेल्यावर खूप प्रसन्नता जाणवते. सुरुवातीला असलेले तळे आपले लक्ष वेधून घेते. तळ्यातील पाणी नितळ असून त्याभोवती आता संरक्षक कडे तयार केले आहे. महादेवाचे शांतपणे दर्शन झाल्यावर आपली पावले मंदिराभोवती असलेल्या वनसंपदेकडे आपसुकच वळतात. या ठिकाणचे वातावरणच खूप आल्हाददायक आहे. मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी, पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी अन् यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. या वनातून थोडे पुढे गेल्यावर छानसा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना प्रमुख आकर्षण आहे. 

कसे जाल? 
ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ बनेश्वरला भेट देण्यास उत्तम मानला जातो. पुणे शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनेश्वरला येण्यासाठी  राज्य परिवहन  गाड्यांच्या मदतीने नसरापूर येथून पुढे बनेश्वरसाठी स्थानिक वाहतुकीच्या मदतीने पोचता येते. या ठिकाणी छोटेखानी हॉटेलमध्ये खाण्याची सोय होऊ शकते. स्वतःचे डबे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेता येतो. 

‘बारा दिवसांचा’ स्पेनमधला नाताळ (जयप्रकाश प्रधान)

 नाताळवर यंदा साऱ्या जगात कोरोनाचं सावट आहे, त्यामुळं या वेळी दरवर्षीच्या उत्साहानं नाताळ साजरा होणं शक्य नाही. पण, त्याच पार्श्वभूमीवर आठवण झाली, ती स्पेनमध्ये चक्क बारा दिवस साजरा होणाऱ्या नाताळ उत्सवाची. सर्वत्र नाताळ सात दिवसांचा असला, तरी स्पेनमध्ये मात्र तो बारा दिवस मानण्यात येतो. काही वर्षांपूर्वी स्पेनमधील ''मलगा'' प्रांतात डिसेंबर - जानेवारी महिन्यांत मी व पत्नी जयंतीनं मुक्काम केला व या नाताळ महोत्सवात सहभागी होऊन त्याची माहितीही घेतली. बारा दिवसांचा, म्हणजे २५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंतचा नाताळ बहुतेक साऱ्या स्पेन राष्ट्रात साजरा होत असला, तरी मलगा या प्रांताचं महत्त्व थोडं निराळं असल्याचं, युरोपमधील मित्रांकडून समजलं. सुमारे सहा लाख लोकवस्तीचं मलगा हे स्पेनमधील सहाव्या क्रमांकाचं मोठं शहर. स्पेनच्या दक्षिण किनारपट्टीवर भूमध्य सागरात उत्तरेकडं ते वसलं आहे. मलगा प्रांतामध्ये सुमारे ३१ लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो व मलगा त्याची राजधानी आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन-चार महिन्यांत युरोपमधील कोणत्याही शहरापेक्षा येथील हिवाळा सुखद असतो. तापमान साधारणतः १७-१८ डिग्री सेल्सिअसच्या घरात राहिल्यानं थंडीचा त्रास होत नाही, शिवाय आनंदही लुटता येतो. त्यामुळं विशेषतः ब्रिटन व युरोपमधील अनेक देशांतील नागरिकांची इथं नाताळमध्ये चांगली गर्दी उसळते. त्यामुळं या बारा दिवसांच्या नाताळचं आकर्षण आणखीनच वाढतं. म्हणूनच मलगामधील ''बेनालमाडेना'' या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वांगसुंदर शहरात आम्ही १५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत मुक्काम केला, मनसोक्त भटकंती केली आणि नाताळची मजाही लुटली.

ख्रिश्चन व पॅगन परंपरांचं एकत्रीकरण म्हणजे हा बारा दिवसांचा नाताळ. ख्रिश्चन परंपरेनुसार २५ डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो. कारण, त्या दिवशी जीझसचा जन्म झाला. ३१ डिसेंबर, म्हणजे वर्षाला निरोप द्यावयाचा व नवीन वर्षाचं स्वागत करायचं. पण, स्पेनमधील ख्रिसमस सोहळा तिथंच थांबत नाही. पाच जानेवारीची रात्र व सहा जानेवारीची सकाळही फार महत्त्वाची मानण्यात येते. ''थ्री किंग्स डे'' (Three King’s Day) म्हणून तो दिवस ओळखला जातो. २४ डिसेंबर ही ख्रिसमसइव्ह असली, तरी २२ डिसेंबरपासूनच नाताळच्या खऱ्याखुऱ्या जल्लोषाला इथं आरंभ होतो. त्या दिवशी मोठमोठ्या रकमांच्या स्पॅनिश लॉटरीज ठिकठिकाणी काढण्यात येतात आणि टीव्हीवर, शाळकरी मुलं गाण्यांतून त्यांच्या विजयी नंबरांची घोषणा करतात. बहुतेक स्पॅनिश लोक बऱ्याच आधीपासून त्या तिकिटांची खरेदी करतात. आपल्याला लॉटरी लागली का, याबाबत प्रत्येकाला मोठी उत्सुकता असते. एकदा का लॉटरीची बक्षिसं जाहीर झाली, की नाताळची सुटी व खरेदी यांना खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि प्रत्येक घर नाताळमय झालेलं दिसतं.

ख्रिसमसइव्हला - नाताळच्या पूर्वसंध्येला स्पॅनिश भाषेत ‘Nochebuena’ असं म्हणतात. २४ डिसेंबरचा हा एक कौटुंबिक सोहळा असतो. जवळचे, लांबचे नातेवाईक एकत्र जमतात आणि वाइन, मांस यांची मेजवानी असते. या जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे, वर्षभर जे पदार्थ आपण खात नाही, असे खास पदार्थ त्या दिवशी बनविण्यात येतात आणि मुख्य म्हणजे, सर्व प्रकारच्या डेझर्टची रेलचेल असते. या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या दिवशी रात्री बहुतेक रेस्टॉरंट्स बंद असतात. कारण जेवणाच्या मेजवान्या प्रत्येकाच्या घरी होतात आणि नातेवाईक, मित्र यांना त्यासाठी आग्रहानं बोलाविण्यात येतं. जे धार्मिक कॅथलिक असतात, ते रात्री जेवणानंतर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. तिथं गिटार, ड्रम आदींवर पारंपरिक गाणी वाजवून, परमेश्वराच्या या सुपुत्राचा जन्म साजरा करण्यात येतो. त्या दिवशी रात्री काही ठिकाणी, Santa claus‘ - ज्याला स्पॅनिशमध्ये ‘Papanoel ‘ म्हणतात, तो मुलांना भेटवस्तू वाटतो. अर्थात, याबाबत इथं निरनिराळ्या प्रथाही आढळून येतात. आता नाताळला नुसती सुरुवात झाली आहे. २५ डिसेंबर हा नाताळचा दिवस. ख्रिसमस इव्हला मस्त मेजवान्या झोडल्या तरी, नाताळच्या दिवशीही सर्व कुटुंबीय जेवणासाठी एकत्र जमतात. पण, आदल्या रात्रीच्या एवढं जेवणाचं स्वरूप मोठं नसतं. आदल्या रात्री ''पापा नोएल''ने काय भेटी दिल्या, त्या सर्वांना दाखविण्याचा कार्यक्रम घराघरांत सुरू असतो.

२५ डिसेंबर साजरा झाल्यानंतर आता लक्ष लागलेलं असतं, २८ डिसेंबरकडं. हा ''होली इनोसन्ट डे'' म्हणून पाळला जातो. स्पेनमध्ये तो ''एप्रिल फुल डे'' म्हणून साजरा होतो. प्रत्येकजण एकमेकांची गम्मत करीत असतो. या दिवशी तुम्ही जे पाहता किंवा ऐकता त्यावर फारसा विश्वास ठेवायचा नसतो.

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. ख्रिसमसइव्ह ही कुटुंबीयांसमवेत, तर नववर्षाची पूर्वसंध्या ही मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली जाते. रात्रीचं जेवण झाल्यानंतर, वर्षाचे शेवटचे क्षण व नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण शहराच्या चौकांत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमतात. मध्यरात्रीनंतर अक्षरश: जल्लोषात, नाच-गाण्यांत आणि आवाज व प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सारा थंडा कारभार, रस्त्यावर अगदी सामसूम असते.

पण अजून स्पेनमधील नाताळ संपलेला नसतो हं ! स्पॅनिश कुटुंबांतील अगदी तरुण मंडळींच्या दृष्टीनं ५ जानेवारी हा फार महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीही सार्वजनिक सुटी असते. प्रत्येक शहराच्या सर्व चौकांत प्रचंड मोठ्या फ्लोट मिरवणुका निघतात. त्यांत वादक, गायक, कलाकार निरनिराळे आकर्षक कपडे घालून सहभागी होतात आणि मुख्य म्हणजे, त्यात तीन राजे (Three Kings) असतात. ते शहरातील सर्व लहान मुलांना हात हलवून, त्यांचं स्वागत स्वीकारतात. परेड संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात. त्या दिवशीचं रात्रीचं जेवण लवकर घेतलं जातं. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील मुलं आपले बूट एकदम स्वच्छ करून घराच्या हॉलमध्ये आणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी अगदी लवकर ''तीन राजे'' त्यांच्या घरात येतात, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी भेटी कुठं ठेवावयाच्या, हे त्यांना त्यामुळं बरोबर समजू शकतं. सहा जानेवारीला जाग आली, की मुलं बूट ठेवलेल्या जागेच्या दिशेनं धावतात. म्हणजे तीन राजांनी कोणाकोणासाठी काय-काय भेटी इथं ठेवल्यात, हे त्यांना समजतं. साऱ्या स्पेनमध्ये हेच चित्र दिसतं....

सहा जानेवारीचा दिवस हा मात्र तसा क्लेशकारक असतो. कारण आज बारा दिवसांचा नाताळ सोहळा व सुटी संपून दैनंदिन जीवन सुरू होणार असतं. पण पुढल्या वर्षीच्या नाताळची वाट पहात रोजच्या कामकाजाला सुरुवात होते.अशी असते स्पेनमधील बारा दिवसांच्या ख्रिसमसची आगळी-वेगळी कहाणी. मलगात आम्हीही या नाताळची मजा लुटली आणि त्या आठवणी मनाच्या कप्प्यात बंद करून, सहा जानेवारीलाच मलगाचा निरोप घेतला.

बारा लकी द्राक्षं
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाला आरंभ करताना, स्पॅनिश संस्कृतीत एक मजेशीर प्रथा असल्याचं समजलं व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता आला. आमच्या रिसॉर्टला लागूनच असलेल्या, कोस्टा डेल सोलच्या किनाऱ्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये बसून, आम्ही शॅम्पेन घेत, त्या वर्षाला निरोप देत होतो. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वेटरनं दोन डिशेशमध्ये प्रत्येकी १२ द्राक्षं आणून आमच्यासमोर ठेवली. आम्हाला काहीच कळेना! वेटरनं सांगितलं, की ''ही १२ लकी द्राक्षं'' आहेत. वर्ष संपायला (१२ वाजायला) १२ सेकंदं राहिली असताना, १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं खायची, म्हणजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं जातं! आम्ही दोघांनीही १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं संपवली.... पुढल्या वर्षीही भरपूर जगप्रवास काहीही अडचण न येता पार पडला. त्यामुळं ती १२ द्राक्षं खरोखरच लकी ठरली, असं मानायला हरकत नाही!

कन्याकुमारीतला सूर्योदय

 

सन २०२० वर्ष संपलं अन् २०२१ सुरू होतंय... गेल्या वर्षात आपण काय केलं? ते वर्ष कसं गेलं? या वर्षात आपले काय संकल्प आहेत? गेल्या वर्षीप्रमाणे अनेक महिने आपल्याला घरीच बसावं लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर सगळेच लोक विचार करतायत. सन २०२० मध्ये काहीच विशेष घडलेलं नाही असंही बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे! मात्र, याव्यतिरिक्त आपलं आयुष्य जगत असताना कितीतरी प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. कोरोनाच्या महामारीचे दिवस संपत असताना आता आपण नव्या दिशेनं वाटचाल करणार आहोत की नाही? स्वत:साठी जगणार आहोत की नाही? हाही विचार आपण केला पाहिजे. महामारी, आंदोलनं, नैसर्गिक संकटं इत्यादी गोष्टी होतच राहतील. त्या यापूर्वीही थांबल्या नव्हत्या व पुढंही होत राहतील. जात-पात-धर्मापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगाकडे नव्या नजरेनं पाहायला सन २०२० नं आपल्याला शिकवलंय... तरी एकविसाव्या शतकात आपण फारच पळतोय का? काही ना काही गाठायचंय यासाठीच कष्ट घेतोय का? अशाही गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं ‘स्लो लाईफ’, म्हणजेच जरा मंद गतीनं, आपण आयुष्य जगलो तर ते अधिक भारी होईल असा विचार आपण का नाही करत?

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सन २०२१ च्या सुरुवातीला काही प्रश्न उपस्थितीत करू या. आपण कुठल्याही देशाच्या पूर्व समुद्रकिनारपट्टीवरून कधी सूर्योदय पाहिलाय? कधी रात्री उशिरा मध्यरात्री बाईक राईड केलीये? कधी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना विमानप्रवास घडवून आणलाय? शंभर-दीडशे किलोमीटर कधी चाललोय का? कधी ‘सोलो ट्रिप’ केलीये का? उत्तरेकडच्या पर्वतरांगांत बर्फ अनुभवलाय का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून ती उत्तरं कृतीत उतरवली पाहिजेत. काही गोष्टी यशस्वी होतील, तर काही अयशस्वीही होतील. कधी तरी अयशस्वी ठरलेले प्रसंगदेखील साजरे केले पाहिजेत! 

जन्मापासून आपण कायमच शिकत आलोय; पण कधी तरी ‘अनलर्निंग’ व्हायचा प्रयत्न केला तर अधिक मजा येऊ शकते. अगदीच चौकटीत जगण्यापेक्षा थोडंसं स्वत:ला सैल सोडून बघूया ना! स्वत: मधमाशीसारखं जगूया ना! प्रवास करत, अनुभव घेत, छोटे-मोठे प्रसंग जगत आयुष्य अधिक समृद्ध करता येतं. ‘ जर्नीज् मेक यू वाईज’ असं कुणीतरी म्हटलंय आणि या जर्नीत किंवा प्रवासात आपण काही तरी शिकू अन् त्याचबरोबर जे काही इतकी वर्षं शिकलोय त्यातल्या काही गोष्टी विसरू या म्हणजेच अनलर्न करू या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असं जगण्याचं शिक्षण जगातल्या कुठल्याच मोठ्या विद्यापीठात पैसे देऊन मिळणार नाही; परंतु हे सारं प्रवासातून मिळवू शकतो. एक असतो तो बाह्य प्रवास - जिथं निसर्ग, प्राणी, हवा, डोंगर, दरी, समुद्र, रस्ते, स्मारकं, मंदिरं अनुभवतो, तर दुसरा असतो अंतर्गत प्रवास - ज्यात स्वत: आपल्या आत डोकावून पाहतो, चिंतन करतो, मनन करतो, स्वत:ला विकसित करतो, स्वत:संदर्भात काही काम करतो.

मानवजात मुळातच भटकी आहे; परंतु आपण कुठल्या ना कुठल्या चौकटीत अडकत गेलो. संत तुकाराम महाराज म्हणतात तसं ‘होय मनासी संवादु। आपुलाची वाद आपणासी।।’ या तत्त्वावर आपण कायम चाललं पाहिजे, तरच आपली स्वत:ची वेळच्या वेळी पानगळ होते व आपण पुन्हा नव्यानं बहरतोही! स्वत:शी असाच संवाद व वाद घालण्यासाठी मी २३ डिसेंबर २०२० रोजी सोलो बाईक राईडला जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांची मेंदूची आणि हृदयाची अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच झाल्या. त्यांना त्यातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. अशा प्रसंगात मी अनियोजित बाईक राईडवर जाण्याचा निर्णय घेऊन निघालो होतो. मी जाऊ नये असंच काहीसं चित्र आईच्या डोळ्यात मला दिसत होते; परंतु २३ डिसेंबरला मी ९९९९ दिवसांचा झालो होतो. अर्थात, २४ डिसेंबर २०२० ला मी २७ वर्षं, चार महिने व १५ दिवसांचा झालो. थोडक्यात काय तर, पृथ्वीवर मी माझ्या आयुष्याचे दहा हजार दिवस पूर्ण केले. यानिमित्त मला काही ना काही तरी करायचं होतं, ज्याचे अनुभव माझ्या आयुष्यात खोलवर रुजतील व त्या आठवणींमध्ये मी जगेन अशी काहीशी भावना माझ्या मनात होती. 

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे याच्या ‘चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!’ या पुस्तकातल्या ‘मी ५९ व्या वर्षाऐवजी १९ व्या वर्षी कन्याकुमारीस जायला हवं होतं’ या लेखानं मला प्रभावित केलं होतं. तो लेख वाचून मी प्रेरित व्हायचो; पण कन्याकुमारी गाठली नव्हती. आयुष्याचा १०००० वा दिवस साजरा करण्यासाठी या सोलो बाईक राईडसाठी पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास निवडला अन् दोनच दिवसांत बेंगळुरूमार्गे ‘Benelli TRK 502X’ या गाडीवर १६०० किलोमीटर अंतर कापून सायंकाळी पाच वाजता पश्चिम किनारपट्टीवर सूर्यास्त पाहायला पोहोचलो. तब्बल दोन तास तिथं बसलो. सूर्य मावळतीला जात असताना एकटक त्याच्याकडे बघत बसलो. आपण भारताच्या शेवटच्या टोकाला बसलोय हा आनंदच वेगळा होता. सायंकाळी सात वाजता एका हॉटेलात (Home Stay) मुक्काम केला व ता. २५ डिसेंबर, नाताळ व माझ्या १०००१ व्या दिवशी पूर्व किनारपट्टीवर पहाटे सहा वाजता जाऊन बसलो अन् सूर्योदय अनुभवला. हा माझ्या आयुष्यातला पूर्व किनारपट्टीवरून पाहिलेला पहिला सूर्योदय होता. हा सोनियाचा दिवस येण्यासाठी २७ वर्षं गेली, याबद्दल मनातल्या मनात स्वत:ला हसत होतो, तर दुसरीकडे हा सुंदर क्षण जगतोय म्हणून स्वत:ची पाठही थोपटत होतो! आपल्या देशातलं हे एकच असं गाव आहे, जिथून पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून सूर्योदय व सूर्यास्त अनुभवता येतो व ते गाव म्हणजे कन्याकुमारी. भारतभूमीच्या दक्षिण सीमेवरच्या अखेरच्या बिंदूवर मी उभा होतो आणि अरबी समुद्र, बे ऑफ बंगाल व हिंद महासागर अशा तीन समुद्रांचा रोमांचकारी क्षण मी अनुभवत होतो...माझ्यासाठी आयुष्यातला हा एक मैलाचा दगड होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

परतीचा प्रवास तुतीकोरिन-चेन्नई- हैदराबाद असा करून मी सात दिवसांनी पुण्यात दाखल झालो. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगण अशा पाच राज्यांतून तीन हजार १४४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. दक्षिणेकडची शेतजमीन जवळून पाहता आली. तिथली परंपरा व खाद्यसंस्कृती समजली. स्थानिक लोकांकडून राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता आला. मात्र, या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे, स्वत:शी सात दिवस गप्पा मारता आल्या. अंतर्मनात डोकावता आलं. कधी संवाद झाला, तर कधी वादही झाला!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

नागझिरा मनाच्या कोपऱ्यातलं जंगल

 

नागपूरपासून जवळच भंडारा जिल्ह्यात एक नितांतसुंदर जंगल आहे. ते म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य. गेली अनेक वर्षं या जंगलानं अनेकांना भुरळ घातली आहे. वेडच लावलं आहे म्हणा ना. एकदा का तुम्ही नागझिऱ्याच्या सहवासात आलात की तुम्हाला निसर्गाचं वेड लागतं आणि मग फक्त निसर्ग निसर्ग आणि निसर्ग... निसर्गाशिवाय तुम्हाला काहीही दिसत नाही. प्रत्येकानं एकदा तरी भेट द्यावं असं हे जंगल. मात्र, नागझिऱ्याच्या जंगलाला केवळ एकदाच भेट देऊन भागणार नाही हेही, तुम्ही एकदा का या जंगलात गेलात की तुमच्या लक्षात येईल. या जंगलाची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मध्य भारतातल्या विविध जंगलांपैकी असं हे एक जंगल असलं तरी इतर जंगलांपेक्षा किंचित् वेगळी भूरचना या जंगलाला आहे. सातपुड्याच्या रांगांमध्ये वसलेलं हे जंगल आपल्या अनोख्या सौंदर्यानं कायम साद घालतं आणि मग हे जंगल मनाच्या कोपऱ्यात कायमचं वसतीला येतं!

तूर्त ‘नागझिरा वन्यजीव अभयारण्या’बद्दल माहिती घेऊ या. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारात मोडणारं हे जंगल सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये आहे. अभयारण्याच्या पिटेझरी प्रवेशद्वारापासून सुमारे १५ किलोमीटरवर पर्यटनसंकुल आहे. आजही जंगलाच्या आत या पर्यटनसंकुलात वास्तव्य करू शकतो. अशा प्रकारची मुभा असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव ‘व्याघ्र राखीव क्षेत्र.’ भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या या अभयारण्यात जैवविविधता ठासून आहेच; शिवाय या जंगलात भौगोलिक विविधताही तितकीच आढळते.

बिबट्यांची लक्षणीय संख्या हे नागझिऱ्याचं वैशिष्ट्य. स्वभावतः बुजरा असणारा हा हुशार आणि धूर्त शिकारी इथं मात्र हमखास दर्शन देतो. आलेवाही पाणघाट, अंधारबन यांसारख्या दाट जंगलांच्या जागा, हत्तीखोदरासारखे विरळ प्रदेश, सातमोडीसारखे घाटरस्ते, गौरीडोह, बंदरचुवा, सर्क्युलर रोड यांसारख्या पाण्याच्या जागा, चितळ मैदानासारखा गवताळ प्रदेश, नागदेव पहाडीसारखे डोंगराळ भाग आणि वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवणारे गौर गल्ली, टायगर ट्रेल यांसारखे भाग आणि निसर्ग पर्यटनसंकुलाच्या बाजूला पसरलेला नागझिरा तलाव या सर्वांनी नागझिऱ्याच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

पुढची पिढी सक्षम होण्यासाठी वयात आलेल्या वाघांनी हद्दीच्या शोधार्थ दुसऱ्या जंगलात जाणं गरजेचं असतं. एकाच कुटुंबातले आई आणि मुलगा अथवा बाबा आणि मुलगी यांचं मीलन झालं तर पुढची पिढी सक्षम होत नाही. अशा वयात आलेल्या वाघांना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित जंगलांचे काही भाग असावे लागतात. त्यांना ‘कॉरिडॉर्स’ म्हणतात. नागझिऱ्याचं त्यादृष्टीनं महत्त्व आहे. 

महाराष्ट्रातले ‘ताडोबा’, ‘बोर’, ‘उमरेड-कऱ्हांडला’, ‘पेंच’, तसंच मध्य प्रदेशातली ‘कान्हा’, ‘पेंच’; आंध्र प्रदेशमधला ‘कावल’ हा व्याघ्रप्रकल्प आणि इतर वन्यजीव अभयारण्‍ये एकत्र जोडण्यात आणि या व्याघ्रप्रकल्पातून होणाऱ्या युवा वाघांच्या स्थलांतरात नागझिऱ्याची मोलाची भूमिका आहे.

वन्यजीव-अभ्यासक किरण पुरंदरे यांनी या जंगलात सलग ४०० दिवस वास्तव्य केलं आणि संपूर्ण ऋतुचक्राचा अभ्यास केला. ‘सखा नागझिरा’ हे नागझिऱ्याच्या त्यांच्या अनुभवांवरचं  पुस्तक प्रसिद्ध आहे. पुरंदरे शहराच्या गजबजाटाला कंटाळून नागझिऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ पिटेझरी गावात कायमस्वरूपी वास्तव्याला गेले. तिथल्या स्थानिक गोंड आदिवासींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरू केले. नागझिऱ्यामध्ये या उपक्रमांना  भेट देता येऊ शकेल आणि हातभारही लावता येऊ शकेल. एखादी गोष्ट, एखादं वेडच असं असतं ज्याची वाट बघण्यात, त्याच्या मागं धावण्यात सगळं आयुष्य निघून जातं. त्या वेडाच्या मागं धावताना मग आपल्याला जाणीव होत राहते...हा ध्यास, हे वेड आपण पूर्ण करू शकलो नाही तरीही हा प्रवासच खूप सुंदर होता, ही ती जाणीव. हा प्रवास थकवा आणत नाही; किंबहुना त्या वेडामागं धावण्याची जास्तच ऊर्मी  देतो...माझ्या निसर्गवेडाची जाणीव मला नागझिऱ्यात आल्यावर पहिल्यांदा झाली. अनेक वर्षं इथे येतोय; पण ही जादू आजही टिकून आहे. 

कसे जाल? 
नागपूर : भंडारा-पिटेझरी-नागझिरा
भेट देण्यासाठी उत्तम काळ : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? 
आवर्जून पाहा :
वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, तीनपट्टी खार, जरबेल उंदीर, मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, रानकुत्रे, खोकड, चांदी-अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर आदी.

पक्षी : सुमारे २५० प्रजातींचे पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ-घार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड(इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, नागझिऱ्याची खासियत असणारा मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी आदी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.

(शब्दांकन : ओंकार बापट)   
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)



 नृसिंह मंदिर, माडगी- देव्हाडा, तुमसर, भंडारा

 #VidarbhaDarshan -














नृसिंह मंदिर, माडगी- देव्हाडा, तुमसर, भंडारा

मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेले प्रभू नृसिंहांचे पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. तुमसर - गोंदिया मार्गावरील माडगी येथे वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडीवर पांढरेशुभ्र नृसिंहाचे मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिरात भगवान नृसिहांची मूर्ती आहे. येथील मंदिराविषयी एक अख्यायिका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू नृसिंह अवतरात खांबातून प्रकट झाले व हिरण्यकश्यपाच्या पोटात आपली तीक्ष्ण नखे खुपसून, आपल्या मांडीवर मांडून वध केला. हे नृसिंहाचे स्वरूपाच्या मुर्तीतून प्रतिबिंबीत होते.कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसाची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीगढ राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत असून वैनगंगेच्या निर्मल , पवित्र पाण्यात स्नान करून पूजन अर्चना केली आहे. यात्रेला प्रारंभ होताच भक्तांचा लोंढा माडगी व देव्हाडा या ठिकाणी असलेल्या नृसिंहांचे पावनधाम तिर्थक्षेत्रा कडे वळत येतो. हजारो भाविक या तिर्थक्षेत्रात गर्दी करत असून अनेक भाविक वैनगंगेच्या निर्मळ पाण्याने स्नान करतात.
नृसिंह भगवंतांच्या मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून सरळ आत गेल्यास खुल्या आकाशा काही हवनकुंड आहे. हवंकुंडाच्या बाजूने मोजक्याच पायऱ्या चढून वर जावे लागते. हाच मंदिराचा सर्वात उंच भाग आहे. या ठिकाणी मंदिर तळघरासारखा भासतो. तेथे दाराजवळ उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे. दरवाज्याच्या समोर समोर उभे असता नृसिंह भगवानाची पाच फुट उंच विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळ खिडकीतून भगवंताच्या मुर्तीवर सूर्य प्रकाश पडून मूर्ती विलोभनीय दिसते. याच मंदिरात गणपती, आदिशक्ती दुर्गा देवी, अन्नपूर्णा देवी इत्यादी पुरातन मुर्त्या आहेत.
राजयोगी अण्णाजी महाराज , सदगुरू योगीराज स्वामी सितारामदास महाराजाच्या आदेशावरून नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळी होती. त्यांनी माडगी येथील नृसिंह टेकडीला सन १९२८ साली भेट दिली होती. अण्णाजी महाराजांनी माडगी येथील नृसिंह टेकडीवर तपश्चर्या, उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. ते ग्रामगितेतील, पुराणातील दाखले देवून भाविक भक्तांच्या शंकेचे निराकरण करत असत.
मंदिराच्या बाजुला असलेले मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे लाईनवरील रेल्वे पूल...
या नदीपात्रात मंदिराच्या बाजूला नदीपात्रात पाहिले असता, मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे लाईनवर असलेलं रेल्वे पुलाचे विहंगम दृश्य नजरेस पडते.
नृसिंह मंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही या तीर्थक्षेत्राचा काहीसा विकास झालेला नाही. आताही या तीर्थक्षेत्राला तुटपुंज्या विकासात समाधान मानावे लागते. भविष्यात जर शासनाने या तिर्थक्षेत्राचा विकास केला तर, स्थनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र मोठ्यास्तरावर नावारूपाला येईल.
प्रतिमा व महिती संकलन- ©Digital Bhandara

पन्ना., नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

   सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. "हा जगून वाचून आला तर आपला" अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच. 

                    मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्‍यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार. 
                    पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ "भगत आणि भग्तीन" एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो. 
                    सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. 
                    सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्‍यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्‍या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्‍यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात. 
                    आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली. 
                    धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्‍या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे. 
                    आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
अशा पाऊलवाटांनी चालणे म्हणजे अवघडच
---------------------------------------------------------------------------
                     काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्‍या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने "एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता" या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्‍या आणि शिखर उतरणार्‍या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे "अन्नदानाचा भंडारा" लागलेला असतो आणि तो सुद्धा अगदी फुकट. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी "गरजू" बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था "अन्नसुरक्षा" प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
नागद्वाराचे प्रवेशद्वार
 ------------------------------------------------------------------ 
 दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

पद्मशेषद्वार
 ------------------------------------------------------------------ 
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

अन्नदानाचा भंडारा - येथे आम्ही पोटभर जेवण घेतले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे. 

------------------------------------------------------------------
Nagdwar

दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

गुळगुळीत वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी 
------------------------------------------------------------------
Nagdwar

थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

या वाटेने अनवाणी चालण्याचा आनंद काही वेगळाच. 
------------------------------------------------------------------ 
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला. 
----------------------------------------------------------------------------------------------------------
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात. 
 ------------------------------------------------------------------ 
Nagdwarचौरागढाचे प्रवेशद्वार. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढण्याला पायर्‍या आहेत पण चढताना देव आठवतोच. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्‍यावर हास्य फुलायला लागले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

प्राचीनकाळीन शिवमंदिर
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

हर हर महादेव
 ---------------------------------------------------------------------------------------------------
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

गरम पाण्याचे कुंड - पाण्यातून वाफ निघते
 -----------------------------------------------------------------------------------------------------
काही वैशिष्टे :

१) पश्चिमद्वार गुफेची उंची ३/४ फूट असल्याने गुफेत वाकून चालत जावे लागते.
२) स्वर्गद्वार गुफेची उंची २/३ फूट असल्याने गुफेत रांगत किंवा सरपटत चालत जावे लागते.
३) हल्दीशेष गुफेत रांगत जावे लागते. आत गेलो आणि आतील दगडांना स्पर्श झाला की आपले अंग आणि कपडे हळदीसारखे पिवळे होऊन जातात.
४) गंगावन शेष गुफेत ५०/७० फूट रांगत किंवा बसून किंवा सरपटत जावे लागते. आत मात्र अत्यंत रमनिय मनोहरी दृष्य अहे. मुर्तीवर होणारा नैसर्गिक झर्‍याचा अभिषेक विलोभनिय आहे.

काही अवांतर :
१) पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि सिमेलगतचे मराठी भाषिक यात्रिकच असतात.
२) नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्‍या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत.
३) प्रांतसिमा आणि पचमढी यामधल्या सौंसर, पांढुर्णा वगैरे भागात अजूनही मराठीच बोलली जाते.
४) नागद्वार यात्रेला प्रशासकिय सुविधा पुरेशा उपलब्ध न होण्यामागे व म.प्र शासकांची भूमिका उदासिनतेची असण्यामागे कदाचित हे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
५) नागव्दार यात्रा बंद करण्यासाठी म.प्र. शासनाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची आतल्या गोटात चर्चा आहे. यावर्षी केवळ १० दिवसाची परवानगी मिळाली हा त्याचाच परिणाम असावा, असा संशय घ्यायला बराच वाव आहे.
६) नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी, व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाहीत. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकंदरित ट्रेन्ड बनलेला आहे.म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता.

७) शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत.

अ) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे.
ब) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही.
क) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

                पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत.

पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.

* नागद्वार यात्रा वर्षातून दोनदा असते.

१) गुरूपोर्णिमा ते नागपंचमी परंतु यावर्षी प्रशासनाने केवळ २ ते १२ ऑगष्ट अशी १० दिवसाचीच परवानगी दिली होती. हीच मुख्य यात्रा असते.
२) वैशाख महिन्यात वैशाखी यात्रा, पण यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो, नि:शुल्क भोजन किंवा अन्य सुविधा देखील नसतात. अजिबात गर्दी नसते. त्यामुळे ही नागद्वार यात्रेसाठी उपयुक्त वेळ नाही.
३) उर्वरित संपूर्ण काळ हा प्रभाग निर्जन असतो.

पंचमढीला कसे जावे? 
* हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी. 
* रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने - अंतर ४५ कि. मी. आहे. 
* नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते - अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.
                                                                                                                              - गंगाधर मुटे

 http://www.misalpav.com/node/25393

 

बुंदेलखंडातल्या पन्ना जिल्ह्यात ‘पन्ना व्याघ्रप्रकल्प’ हे अप्रतिम जंगल आहे. या जंगलाच्या संवर्धनासाठी सन १९८१ मध्ये ‘पन्ना राष्ट्रीय उद्याना’ची स्थापना करण्यात आली. पुढं सन १९९४ मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला; पण चोरट्या शिकारी आणि विविध कारणांमुळे सन २००९ पर्यंत इथल्या सर्व वाघांचा निःपात झाला आणि ‘व्याघ्रप्रकल्प असूनही जंगलात एकही वाघ नाही,’ अशी स्थिती निर्माण झाली!

‘जंगल वाचवायचं असेल तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्यक आहे,’ असं मत काही विवेकी, विचारी, अभ्यासकांनी मांडलं. मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. सन २००९ मध्यए बांधवगड आणि कान्हा या दोन व्याघ्रप्रकल्पांतून दोन वाघिणी पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आल्या. बांधवगडमधून आणलेल्या वाघिणीला नाव देण्यात आलं ‘T-१’ आणि कान्हातून आणलेल्या वाघिणीला ‘T-२.’ मात्र, याचदरम्यान पन्नात वावरणारा शेवटचा नरवाघही नाहीसा झाल्यानं या वाघिणी साथीदाराशिवाय इथं टिकतील का अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केली. आणि मग सन २००९ मद्ये ‘पेंच व्याघ्रप्रकल्पा’तून ‘T-३’ नावाचा नरवाघ इथं आणण्यात आला. पन्नाचं गतवैभव पुन्हा उभं करण्याच्या याकामी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांचं नाव आर. श्रीनिवास मूर्ती. मूर्ती यांनी त्यासाठी ‘भगीरथप्रयत्न’ केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या नवीन वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या वाघांच्या गळ्यात ‘रेडियो कॉलर’ नावाचं उपकरण बांधण्यात आलं. यातून निघणारे सिग्नल्स एका अँटिनाद्वारे मिळवले जातात. या कामावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आर. श्रीनिवास मूर्तींनी काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आणि अखेर एक खडतर ‘तपश्चर्या’ सुरू झाली.

T-१ आणि T-२ यांनी पन्नाच्या भूमीचा त्यामानानं लवकर स्वीकार केला. इथं त्या मुक्तपणे वावरू लागल्या. प्रत्येक वाघाची स्वतःची हद्द ठरलेली असते. T-१ आणि T-२ यांनीही आपापल्या हद्दी निश्चित केल्या; पण T-३ नरवाघानं पन्नाचं जंगल मात्र पटकन स्वीकारलं नाही. T-३ नं एक दिवस पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा प्रदेश सोडला आणि ‘पेंच’च्या दिशेनं तब्बल ४४२ किलोमीटरचा प्रवास केला. पन्नापासून त्याचं अंतर जसं वाढत गेलं तसं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्याला शेवटी जेव्हा पुन्हा बेशुद्ध करून पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याच्या तैनातीला तब्बल ७० कर्मचारी, चार हत्ती आणि  स्वतः मूर्ती असा फौजफाटा होता. 

आता मात्र पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा तो ‘पन्ना’चं जंगल सोडून जाऊ नये म्हणून T-३ ला या दोन्ही वाघिणींकडे आकृष्ट करण्यासाठी मूर्ती यांनी नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी T-३ ला सोडायच्या वेळी वाघिणींचं मूत्र आणि पाणी यांच्या मिश्रणाचा ठिकठिकाणी शिडकावा केला. हा बाण बरोबर बसला. T-३ दोन्ही वाघिणींच्या शोधार्थ निघाला. अखेर दोन्ही वाघिणींनी त्याला जोडीदार म्हणून स्वीकारलं आणि सरतेशेवटी मूर्ती आणि त्यांच्या टीमच्या अथक् प्रयत्नांना यश आलं.

ता. १६ एप्रिल २०१० या दिवशी T-१ या वाघिणीनं चार पिल्लांना जन्म दिला. अशा प्रकारच्या वाघांच्या या पुनर्परिचयाच्या यशस्वितेचं पन्ना हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. यापाठोपाठ T-२ नं ऑक्टोबर २०१० मध्ये चार पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर आणखी चार वाघांना इतर व्याघ्रप्रकल्पांतून पन्ना इथं आणण्यात आलं. हळूहळू वाघांची सख्या वाढत जाऊन आज सुमारे ४० वाघ पन्नामध्ये आहेत.

इथल्या वाघांच्या बच्च्यांची नाव ठेवण्याची पद्धत मोठी अनोखी आहे. उदाहरण म्हणून आपण T-१ ला झालेल्या बछड्यांना ठेवलेली नावं पाहू या. या चार पिल्लांना नावं दिली होती - P१११, P११२, P११३ आणि P११४. यातलं ‘P’ म्हणजे पन्ना. १११ मधला पहिला ‘१’ म्हणजे आईचं ‘T१’ हे नाव दर्शवतो. दुसरा ‘१’ म्हणजे, पहिल्या वेळेच्या बछड्याचा निदर्शक आणि तिसरा ‘१’ हा चारमधल्या बछड्याचं नाव दर्शवतो. आत्ता T-१ नं पाचव्यांदा बच्चांना जन्म दिला आहे. त्यामुळे त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत P१५१ आणि P१५२, तसंच T-२ च्या बच्च्यांना नावं दिली आहेत P२११, P२१२ अशी.

माझ्या मते वाघांना ‘सोनम’, ‘माया’, ‘गब्बर’, ‘जय’ अशी नावं देणं हे त्या वाघांभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण करतं. हे असं करणं एकूणच वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तारकही आहे आणि तितकंच मारकही. जंगलातल्या प्रत्येक वाघाला सारखंच; पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेगळ्या नावांनी हे वाघ प्रसिद्ध झाले की त्या भागातलं पर्यटन त्या वाघांभोवती केंद्रित होतं आणि मग काही अत्युत्साही पर्यटकांमुळे या सगळ्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. मला वाटतं, पन्ना व्याघ्रप्रकल्पाच्या प्रशासनानं ही आगळीवेगळी पद्धत रूढ केली आणि इथं गाईड म्हणून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक वाघाची ओळख याच नावानं लोकांना करून दिली. प्रशासन आणि गाईड या दोघांनीही हा एक आदर्शच इतर व्याघ्रप्रकल्पांसमोर ठेवला आहे.      

‘कर्णावती’ ही नदी म्हणजे इथं वास्तव्याला असणाऱ्या अनेक जीवांची जीवनवाहिनी. अत्यंत शुद्ध असणारा तिचा प्रवाह ‘पन्ना’च्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. पन्ना राष्ट्रीय उद्यान, गंगाऊ अभयारण्य आणि केन-घडियाल अभयारण्य यांच्या एकत्रीकरणातून ‘पन्ना’ व्याघ्रप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘पन्ना’चा भूभाग अनेक छोट्या-मोठ्या नद्या, असंख्य छोटे जलप्रवाह, गवताळ भाग, डोंगररांगा आणि नैसर्गिकरीत्या बनलेल्या अवाढव्य घळी यांनी तयार झालेला आहे. इथल्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या सात प्रकारच्या गिधाडांच्या वास्तव्याचं ठिकाण असलेली ‘धुंधवा सेहा’ ही घळ म्हणजे इथल्या जंगलाच्या उत्पत्तीच्या वेळी झालेल्या हालचालींचा उत्कृष्ट नमुना होय. 

या लेखाच्या निमित्तानं मी आज गतकाळाचं सिंहावलोकन केलं. ‘० ते सुमारे ४५ वाघ’ असा यशस्वी टप्पा गाठणारा प्रवास अनेक लोकांच्या प्रयत्नांच्या परिसीमेचं फलित आहे. या व्याघ्रप्रकल्पाच्या या ‘टिकवल्या’ गेलेल्या वैभवाला आणखी एक धोका काळ बनून उभा आहे व तो म्हणजे केन-बेतवा नदीजोड प्रकल्प. केन म्हणजेच कर्णावती. कर्णावती आणि बेतवा या दोन नद्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे संपूर्ण मडला गाव आणि जंगलाचा खूप मोठा भूभाग पाण्याखाली जाणार आहे. हा धोका परतवून लावण्यासाठी मूर्ती यांच्यासारखा एखादा ‘भगीरथ’ पुन्हा एकदा उभा राहील आणि जंगलाचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्याचं; किंबहुना ते वाढवण्याचं ‘शिवधनुष्य’ तो लीलया पेलेल याची मला खात्री आहे!

कसे जाल 
पुणे-मुंबई-जबलपूर-पन्ना/पुणे-मुंबई-सतना-पन्ना.  
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे.
काय पाहू शकाल  
सस्तन प्राणी : बिबट्या, कोल्हा, खोकड, तरस, अस्वल, चिंकारा, चौशिंगा, नीलगाय चितळ, सांबर, भेकर, वाघ आदी.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी घार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, गिधाडं आदी.
सरपटणारे प्राणी : मगर, कासव, अजगर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.
भेट देण्यायोग्य जवळची ठिकाणं : पांडव फॉल, रणेह फॉल, केन घडियाल अभयारण्य, खजुराहो मंदिरं.  

(शब्दांकन : ओंकार बापट)

तुवालू... जगा‘वेगळा’ देश!

 

‘एक दिवस आम्ही अदृश्य होऊन जाऊ...’ तुवालू (Tuvalu) देशाचे नागरिक गेली काही वर्षं असं म्हणतायत. तिथला समुद्र सर्व वाळू खाऊन टाकत आहे. पूर्वी तिथं वाळू लांब लांब पसरली जायची आणि लोकांना तिथं प्रवाळ स्पष्टपणे दिसायचं. आता तिथं सतत ढगाळ वातावरण असतं आणि प्रवाळही नष्टप्राय झालं आहे. तुवालू बुडत आहे...

एखादा देश बुडत आहे...हे वाचून भीतिदायक वाटतं ना? पण खरंच तुवालू बुडत आहे!  तुवालू या देशाला आजवर खूप कमी जणांनी भेट दिली आहे. खूप कमी पर्यटकांचे पाय तुवालूला लागले आहेत. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टूरिझम’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरातून केवळ दोन हजार लोक तुवालूला भेट देतात. ‘फेसबुक’वरच्या माहितीनुसार, केवळ १० हजार लोकांनी तिथं ‘चेक इन्’ केलंय. ‘The least visited place or country on Earth,’ असंही तुवालूचं वर्णन केलं जातं.

प्रत्येक देशाचे व देशातल्या लोकांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न वेगळे असतात. जगभरातल्या विविध लोकांचे वैयक्तिक प्रश्न तर आणखीच भिन्न भिन्न आहेत. या सर्व प्रश्नांची एकमेकांशी तुलना आपण करू शकत नाही. कारण, भौगोलिक, ऐतिहासिक, पारंपरिक, सामाजिक रचना वेगवेगळ्या आहेत; परंतु ‘आपलेच प्रश्न मोठे’ असं काही आपण समजता कामा नये. आयुष्य जगताना आपण सहज म्हणून इतरांच्या प्रश्नांकडेही पाहायला शिकलं पाहिजे. त्या प्रश्नांची तीव्रता आपल्याला संपूर्णपणे लक्षात नाही येणार कदाचित; पण त्यांचा निदान अंदाज तरी येऊ शकतो आणि मग आपलाही आपल्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या अर्थानं बदलत जातो. मग उत्तरंदेखील सापडत जातात आणि त्या प्रश्नांकडेही आपण वास्तववादी दृष्टीनं पाहू लागतो. 

तुवालू हा दक्षिण पॅसिफिकमधला नऊ लहान बेटांचा समूह आहे. या देशाचे प्रश्नच जगावेगळे आहेत. तिथल्या नागरिकांना देशाचं आणि पर्यायानं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागत आहे. या देशाचे प्रश्न किती गंभीर आहेत याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. 

सन १९७८ मध्ये तुवालू ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पूर्वी या देशाची ओळख ‘एलिस आयलंड्‌स’ अशी होती. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडे फिजी देश असून फिजीच्या उत्तरेला तुवालू हा देश आहे. फुनाफुटी ही तुवालूची राजधानी आहे. तुवालूंच्या नागरिकांची भाषा आहे तुवालूअन. ‘गूगल मॅप्स’वर पाहिलं तर हा देश दिसत नाहीच; परंतु नावानं शोध घेतल्यास लगेच सापडतो. गूगलवर हा देश खूपच कमी लोकांनी ‘सर्च’ केला असेल.  तुवालू देश अतिशय छोटा असून त्याचं क्षेत्रफळ २६ स्क्वेअर किलोमीटर आहे.  इथं कुठंही उभं राहिलं की दोन्ही बाजूंचा समुद्र दिसतो. गाडीवरून चक्कर मारायची म्हटलं तर हा देश अवघ्या नऊ किलोमीटरचाच आहे. अर्ध्या-पाऊण तासात संपूर्ण देशभर चक्कर मारता येते!

‘येत्या काही वर्षांत तुवालू देश ग्लोबल वॉर्मिंगमुळे नाहीसा होऊ शकतो,’ अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानं सन १९८९ मध्येच दिला आहे. ‘वातावरणातले बदल/ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुवालूची पूर्णपणे वाट लागली आहे, म्हणून तुवालू बुडत आहे,’ असं म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून साधारणत: सरासरी दोन मीटर इतकं या देशाचं अंतर आहे आणि सध्याच्या वेगानं महासागराच्या वाढीचा अंदाज घेतला तर पुढच्या ३० ते ५० वर्षांत हा देश अदृश्य होऊ शकतो असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘टाईमलेस तुवालू’ अशीही या देशाची एक ओळख आहे.  तुवालूला कुठल्या भारतीय प्रवाशानं आजवर भेट दिली आहे किंवा कसं याचा शोध मी घेत आहे. या देशाबद्दल कुणाला काही माहिती मिळाली तर ती इतर लोकांपर्यंत पोहोचायला हवी. एखादा देश, एखादं ठिकाण प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव वेगळेच असतात. त्या संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतचे किस्से ऐकण्याचा आनंद वेगळाच.

या जगात तब्बल १९६ देश आहेत. यांपैकी किती देशांत मी जाऊ शकेन माहीत नाही; परंतु जमलंच तर तुवालूला मी नक्कीच जाईन. तिथं जायला विमानखर्च खूपच येईल हे खरं आहे; पण मी ‘बजेट ट्रॅव्हल’ नक्कीच करू शकतो यात शंका नाही. तुवालू बुडेल की नाही हे येणारा काळच ठरवेल; पण दुर्दैवानं तसं घडलंच तर ते घडण्यापूर्वी तिथं जाऊन यायलाच हवं. ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी हे करावं. कारण, असे स्वर्गीय सौंदर्याचे देश पाहण्याची संधी पुनःपुन्हा येत नसते. तर मग, बघू या... जाऊ या कधीतरी तुवालूमध्ये...स्वप्न पाहायला काय हरकत आहे? त्यातूनच तर ‘जिंदगी वसूल’ करण्याची ऊर्जा मिळत असते!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

'बजेट ट्रॅव्हल' म्हणजे नेमकं काय?

 प्रवास किंवा पर्यटन म्हटलं की देव-धर्म, मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशीद असं सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. ‘आयुष्यात अमुक मंदिराला किंवा तमुक दर्ग्याला भेट दिलीच पाहिजे,’ असं आपण ठरवतो व तसं काही प्रमाणात करतोही. मात्र, पर्यटन म्हणजे फक्त तेवढंच असं अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारचा आणि ठिकाणचा प्रवास माणसाला समृद्ध करतो हे आपण जसजसा जास्त प्रवास करत जातो तसतसं उलगडत जातं. त्यामुळे धार्मिक स्थळांव्यतिरिक्तही आपण भटकलं पाहिजे असं ठरवा आणि मग बघा, किती वेगळी मजा येते ते! अशा पर्यटनानंतर आपण नक्कीच जगाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. वयाच्या हिशेबानं आपण जितक्या लवकर जग फिरायला बाहेर पडू तितके आपण बहरत जाऊ, फुलत जाऊ अन् समृद्ध होऊ... 

मी ‘बजेट ट्रॅव्हल’ करतो; जेणेकरून शंभरहून अधिक देश मला फिरता यावेत. मात्र, ‘बजेट ट्रॅव्हल’ म्हणजे नेमकं काय? ते कुणालाही जमू शकतं का? ते कसं करता येतं? फिरायचं तर आहे; पण त्याला खूप पैसे लागतात अशी ‘मिथकं’ आपल्या मनात तयार झालेली असतात, ती एकदम बाजूला सारा आणि स्वत:ला ठणकावून सांगा...होय, मीही ‘बजेट ट्रॅव्हल’ करू शकतो...!

मित्रांनो, कुठंही प्रवास करताना तीन गोष्टींसाठीचा खर्च सर्वात जास्त असतो.  पहिली गोष्ट म्हणजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवासखर्च (Transportation), दुसरी बाब म्हणजे, राहणं/निवास (Accommodation) आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तिथलं खाणं-पिणं (Food & Beverages). 

आता यापैकी जर आपण विमानप्रवासाची तिकिटं तीन महिने आधीच आरक्षित केली तर प्रवासखर्च फारच स्वस्त पडतो. राहण्याच्या सोईबाबत सांगायचं तर, होस्टेल, Couch surfing, Airbnb किंवा अन्य काही वेबसाईट्‌सवर जाऊन रिसर्च करून आरक्षण केलं तर बऱ्याच ऑफर्सही मिळतात. 

आता खाणं- पिणं.  हे जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक पातळीवरचंच करायचं. हे सगळं केल्यानं पैसेही वाचतात व नवनवे अनुभवही येतात. असं केलंत की झालात तुम्हीही ‘बजेट ट्रॅव्हलर’! 

आपण एका ठरावीक काळानंतर आयते कपडे घालणं बंद करतो व आपल्याला हवे तसे कपडे शिवून घेतो. प्रवासाबाबतही तसंच आहे. आपणही आपला प्रवास कधी तरी स्वत: क्युरेट, क्राफ्ट अन् कस्टमाईझ (Curate, Craft & Customise) करू या ना...म्हणून मी अशा संकल्पनेला नाव दिलं आहे : ‘डू इट युवरसेल्फ’!

एक किस्सा सांगतो. सन २०१९ च्या ऑगस्टमध्ये आपण कुठं तरी परदेशात असायला हवं असं मी ठरवलं. निमित्त काय होतं? तर मी माझा जन्मदिवस कधीच परदेशात साजरा केला नव्हता. आता मला ते करायचं होतं. पंचविशी आली तरी आपण हे करू शकलो नाही ही खंत माझ्या मनात होती. तर ऑगस्टच्या आधी तीन महिने, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, मी लॅपटॉप घेऊन माझ्या दोन-तीन मित्रांबरोबर मध्यरात्रीपर्यंत पुण्यात एका हॉटेलात बसलो होतो. ‘ज्या देशाचं विमानतिकीट स्वस्त, तो देश फिरायला जायचं,’ असा माझा सिम्पल फंडा होता. सिंगापूर-मलेशिया या दोन देशांचा विमानप्रवास अवघ्या १६ हजार रुपयांत होतोय हे त्यात मला दिसलं. क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेऊन मी चार फ्लाईट्सचं आरक्षण करून टाकलं. मी हे करत असताना हॉटेलात माझ्याबरोबर असलेला मित्र चिन्मय यालाही परदेशवारी करण्याची इच्छा झाली अन् त्यानंही माझ्याबरोबर येण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतला. थोड्या दिवसांनी आम्ही दोघं आपापला जन्मदिवस साजरा करण्यासाठी सिंगापूर-मलेशियाला जातोय हे दुसरे दोन मित्र - सागर आणि सुमित -  यांना कळलं, तर त्यांनी आमच्याशी वाद घातला. ते म्हणाले : ‘‘आम्हाला का नाही विचारलंत?’’ मग त्या दोघांनीही विमानतिकिटं आरक्षित केली. ‘More the merrier,’ असं काहीसं आमचं झालं व आम्ही मध्यमवर्गीय चार मित्र या दोन देशांच्या परदेशवारीसाठी सज्ज झालो. एकाचा जन्मदिवस सिंगापूरमध्ये, तर दुसऱ्याचा मलेशियामध्ये! सिंगापूरचा व्हिसा एका व्हिसा एजन्सीकडून करून घेतला; पण मलेशियाचा व्हिसा आम्ही आमचा स्वत: केला. दोन्ही व्हिसांचा खर्च प्रत्येकी फक्त चार हजार ५८५ रुपये एवढा आला. एकंदर खर्चापैकी मोठ्या खर्चाचा विषय हा असा मार्गी लागला. आता राहणं, खाणं-पिणं व तिथं फिरणं या खर्चाविषयी विचार करायचा होता. दहा दिवसांचा प्लॅन ठरला अन् मग पुन्हा एक-दोन दिवस नीट रिसर्च करून राहण्यासाठी विविध ठिकाणांसाठी Airbnb वर आरक्षण केलं. हे आरक्षण करताना, जिथं आमचा आम्हाला स्वयंपाक करता येण्याची सोय असेल अशीच ठिकाणं निवडून त्यांचं आरक्षण केलं. 

एका पर्यटकाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर भारतात राहणं (Aaccommodation) खर्चाच्या दृष्टीनं परवडणारं नसतं. इतर काही देशांत एका रात्रीच्या मुक्कामासाठी सरासरी आठशे ते हजार रुपयांचा खर्च येतो. सिंगापूरला पाच दिवस व चार रात्री राहण्याचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३२२ इतका आला, तर मलेशियात चार दिवस व तीन रात्रींचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३६६ इतका आला. आम्ही चौघांचा ग्रुप असल्यामुळे हा निवासखर्चही स्वस्तात पडला. 

एक रात्र सिंगापूर ते क्वालालंपूर, मलेशिया असा बसप्रवास आम्ही ९५० रुपयांत केला. त्यामुळे एका रात्रीचा राहण्याचा खर्चदेखील वाचला. स्वयंपाकासाठी जेमतेम किरणासामान आम्ही इथूनच नेलं होतं. सागर-सुमितनं स्वयंपाक केला आणि मी-चिन्मयनं भांडी घासली. गंमत म्हणजे, प्रत्येकानं ‘टूर लीडर’ म्हणून एकेक दिवस जबाबदारी घ्यायची असं ठरवलं आणि तसं केलं. विशिष्ट बजेटमध्ये जो तो दिवस पार पाडायचा असा नियम केला होता, त्यामुळे अंतर्गत प्रवास, खाण-पिणं व पर्यटनस्थळांच्या तिकिटांचा दहा दिवसांचा प्रत्येकी खर्च  २० हजार ४८६ इतकाच आला. संपूर्ण सिंगापूर व मलेशियातल्या क्वालालंपूर, जॉर्जटाऊन आणि लांकावी आयलंड या ठिकाणी आम्ही फिरलो. काही तडजोडीही कराव्या लागल्या. नाही असं नाही. आम्ही १० दिवसांत जवळपास ८० किलोमीटर पायी चाललो, मेट्रोचाही वापर केला. रात्रभर फिरत राहिलो, स्थानिक खाद्यपदार्थ चाखले, काही ठिकाणी कहर केला अन् काही ठिकाणी स्वयंपाकही केला! असे १० दिवस आम्ही चार वेळा विमानप्रवास, दोन देश पूर्णपणे भ्रमंती करून प्रत्येकी एकूण ४८ हजार ७०९ रुपयांमध्ये वसूल केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

थोडक्यात काय तर, आम्ही ‘बजेट ट्रिप’करून आमची ‘जिंदगी वसूल’ केली. 
तर मग, तुम्हीही करणार ना ‘बजेट ट्रॅव्हल’? कधी करताय सुरुवात...?

घाटांचा मेळ... मेळघाट

 

पांडवांचा अज्ञातवास सुरू होता...विराट राजाच्या आश्रयाला आलेले पांडव आणि द्रौपदी हे नाव आणि वेश बदलून विराटनगरीत राहत होते... बारा वर्षांचा वनवास संपला होता; पण एक वर्षाचा खडतर अज्ञातवासाचा काळ शिल्लक होता... ‘या काळात कुणीही या सहांपैकी कुणालाही ओळखलं तरी पुन्हा बारा वर्षं वनवास भोगायचा,’ अशी अट कौरवांनी द्यूतप्रसंगी घातलेली होती... अत्यंत कठीण असं हे वर्ष संपत आलं होतं; पण तितक्यात महाराणी सुदेष्णाच्या भावाची - कीचकाची - नजर तिची दासी बनून राहिलेल्या सैरंध्रीवर, म्हणजेच द्रौपदीवर पडली. द्रौपदीच्या सौंदर्यावर मोहित झालेल्या कीचकानं द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात केली. द्रौपदीनं या संकटाविषयी विराटाच्या मुदपाकखान्याचा आचारी बनलेल्या ‘बल्लवा’ला म्हणजेच भीमाला सांगितलं. ‘तू कीचकाला रात्री नृत्यशाळेत बोलाव, मी त्याचा समाचार घेतो,’ अशा शब्दांत भीमानं तिला आश्वस्त केलं. ठरल्यानुसार कीचक तिथं गेला असता भीमानं कीचकाचा वध करून त्याला एका दरीत टाकलं. पुढं या दरीला ‘कीचकदरा’ असं नाव पडलं. ही पौराणिक कथा सांगण्याचा उद्देश एवढाच की ही आख्यायिका ज्या ‘कीचकदरा’शी जोडली गेली आहे त्या नावाचाच पुढं अपभ्रंश होऊन ‘चिखलदरा’ झाला. 

आजच्या लेखाचा विषय असलेला ‘मेळघाट व्याघ्रप्रकल्प’ इथलाच.

कीचकाला ठार मारल्यावर भीमानं ज्या कुंडात हात धुतले अशी कथा आहे, त्या कुंडाला आजही ‘भीमकुंड’ या नावानं ओळखलं जातं. असा पौराणिक वसा जपणाऱ्या या स्थळानं आणखी एक वारसा आजही जपलाय, आजही एक वैभव टिकवून ठेवलंय व ते म्हणजे ‘व्याघ्रवैभव’. ‘मेळघाट व्याघ्रप्रकल्प’ अतिशय विलक्षण भूभागासाठी प्रसिद्ध आहे. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या सुमारे एक लाख होती अस म्हटलं जातं. पुढं ब्रिटिशांनी आणि राजे-महाराजांनी ‘शौर्याचं प्रतीक’ म्हणून वाघांची बेसुमार शिकार केली. स्वातंत्र्योत्तर काळातही परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता आणि अवयवांच्या चोरट्या व्यापारासाठी वाघांची शिकार होतच राहिली. सन १९७० च्या दरम्यान वाघांची संख्या सतराशेच्या आसपास घसरली. या अधोगतीला एका पोलादी स्त्रीनं आवर घातला व त्या म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांच्या प्रयत्नांनी आणि पुढाकारानं सन १९७३ मध्ये भारतातल्या नऊ जंगलांना ‘व्याघ्रप्रकल्प’ हा दर्जा देण्यात आला. ‘मेळघाट’ हा त्याच नऊ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. महाराष्ट्रातला सर्वात पहिला व्याघ्रप्रकल्प. मेळघाटाची भौगोलिक विविधता विलक्षण आहे. भूप्रदेशाच्या बाबतीत एवढी विविधता असूनही आजही मेळघाटात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

‘मेळघाट’ म्हणजे घाटांचा मेळ. मेळघाट-सातपुडा-मैकल या भूप्रदेशातल्या सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलं आहे. सातपुड्याच्या रांगांपैकी गाविलगड ही रांग इथं पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. मेळघाट हा व्याघ्रप्रकल्प या रांगांच्या उत्तरेला आहे. ‘वैराट’ हे व्याघ्रप्रकल्पातलं सर्वात उंचीवरचं ठिकाण समुद्रसपाटीपासून ११७८ मीटर उंचीवर आहे. मेळघाट हा दऱ्या-खोऱ्यांचा, घनदाट जंगलांचा प्रदेश. ‘सिपना’ ही मेळघाटातली महत्त्वाची नदी. सिपना या शब्दाचा अर्थ साग. सागाची झाडं मेळघाटात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या झाडांमधून वाहणाऱ्या या नदीला ‘सिपना’ असं नाव पडलं. याशिवाय खंडू, खापर, गाडगा आणि डोलार या आणखी चार नद्या मेळघाटातून वाहतात. सिपनासह या चार नद्याही पुढं तापी नदीला मिळतात. मेळघाटात चिखलदरा, चीलदरी, पातुल्डा आणि गुगामल ही अतिशय दुर्गम ठिकाणं. शिवाय, मेळघाटात नर्नाळा नावाचा किल्ला आहे. हा वनदुर्ग आहे, म्हणजे त्याच्या चारी बाजूंना घनदाट जंगल आहे.

मेळघाटात एका अत्यंत दुर्मिळ घुबडाचा आढळ आहे. ते म्हणजे फॉरेस्ट औलेट. पूर्वी हा पक्षी मध्य प्रदेशात व महाराष्ट्राच्या अन्य भागांतही मोठ्या संख्येनं आढळत असे; पण नंतरच्या काळात तो नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. साधारणपणे दिवसा सक्रिय असणाऱ्या या पक्ष्याचा शोध रात्रीच्या वेळी घेतला गेल्यामुळे मेळघाटात त्याचा असलेला वावर निदर्शनास आला नाही. सन १९९७ मध्ये तो दृष्टीस पडल्यावर त्याचा पुन्हा शोध घेण्यात आला आणि त्याची पुन्हा नोंद करण्यात आली. 

या पक्ष्याला मराठीत ‘वनपिंगळा’ असं म्हणतात. गडद करडा, तपकिरी रंग असलेला हा पक्षी साधारणतः साळुंकीएवढा आहे. याच्या कपाळावर आणि पाठीवर अगदी अस्पष्ट ठिपके असतात. पंखांवर आणि शेपटीवर रुंद तपकिरी-काळपट आणि पांढरे पट्टे असतात. छातीचा रंग गडद तपकिरी असून छातीच्या वरील भागावर पांढरे पट्टे असतात. पोटाकडचा भाग पांढरा स्वच्छ असतो. उंदीर, कीटक, पाली, सरडे हे मुख्य खाद्य असणारा हा पक्षी कधी कधी छोट्या पक्ष्यांचीही शिकार करतो. पानझडी जंगलात याचं वसतिस्थान आहे. सागवानबहुल पानगळी जंगल असलेल्या मेळघाटात या पक्ष्याची संख्या लक्षणीय आहे. मेळघाटात हा पक्षी नर्नाळा, वान, तोरणमाळ, चौराकुंड या भागात सापडतो. डॉ. प्राची मेहता यांच्या संस्थेमार्फत या  वनपिंगळ्यावर शास्त्रीय अभ्यास मेळघाटात सुरू आहे. या अभ्यासाद्वारे या पक्ष्याच्या संवर्धनाचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेळघाटच्या जंगलाला माझ्या मनात एक विशिष्ट स्थान आहे. एकतर मी पाहिलेलं हे पहिलं जंगल, त्यामुळे या जंगलानं मला खूप गोष्टी शिकवल्या. चिकार अनुभव दिले. इथं मी अगदी सगळ्या ऋतूंमध्ये मनसोक्त भटकलो. निसर्गाचा कोरडा चेहरा बघितला, कुडकुडायला लावणारी थंडी बघितली आणि निसर्गाचं रौद्र रूपही. इथल्या सातपुड्याच्या डोंगररांगा, उंच उंच शिखरं, तळ दिसणार नाहीत अशा दऱ्या, त्यांच्या पाठीवर पसरलेलं विस्तीर्ण जंगल, नजर जाईल तिथं दिसणारं घनदाट अरण्य, मोठमोठी गवताळ कुरणं, प्रचंड आवाज करत डोंगरावरून खाली उड्या मारणारं नद्यांचं अवखळ पाणी, नागासारख्या चालीनं जाणारी सिपना नदी आणि या सर्वात ठायी ठायी भरलेली जैवविविधता यामुळे मी मेळघाटाकडे अक्षरशः ओढला जातो. वर्षातून एकदा तरी इथं आल्याशिवाय मला चैन पडत नाही. इथं आलो की मग जाणवतं की आपल्यावर निसर्गाचा किती वरदहस्त आहे ते. निसर्गानं आपल्यावर वेगवेगळ्या रंगांची उधळण केली आहे. त्या रंगांत रंगून जायचं की आपला वेगळा रंग दाखवायचा हे आपल्या हातात आहे. निसर्ग सतत आपल्यावर अमृतवर्षाव करत आला आहे. त्याच्या या बरसणाऱ्या धारांमध्ये चिंब भिजायचं की कोरडा पाषाण बनून राहायचं हे आपण ठरवायचं आहे. त्याचा हात हातात घेतला की आपल्या जीवनाच्या प्रवासाला खरी मजा येईल. हात सोडला तर मात्र ही दूर जाणारी वाट कदाचित आपल्याला वाळवंटाकडेच घेऊन जाईल!

कसे जाल? : 
पुणे-बडनेरा-मेळघाट
भेट देण्यासाठीचा उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी :
मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्यामांजर, साळिंदर, ससा, वानर, रानकुत्री, चांदी-अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी-हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर.

पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी-घार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी-घुबड,  पिंगळा, वनपिंगळा, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, नवरंग, सुतारपक्षी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसं, मण्यार, घोणस.

वृक्ष : साग, ऐन, अर्जुन, बेहडा, बिजा, भेरा, बोर, बेल,चीचवा,धावडा,कुसुम, मोह, मोवई, रोहन, सालई, करू, सावर, शिसम, शिवण, सूर्या, तेंदू, इ. 

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

तारूच्या जंगलात...!

 

अगदी पुराणकाळात एका गावातला ‘तारू’ नावाचा युवक आणि वाघ एकदा समोरासमोर आले. कितीही झालं तरी वाघाची आणि तारूची ताकद यात फरक होता. दोघांमध्ये खूप वेळ चाललेल्या जोरदार झटापटीनंतर तारूनं देह ठेवला; पण या घटनेनं तारूला देवत्व मिळवून दिलं. आपल्यापेक्षा अधिक मोठ्या शक्तीशी सामना करताना मरण आलं तर अशा व्यक्तीची आदिवासी लोकांमध्ये देव मानून पूजा केली जाते. फरक एवढाच की आदिवासी लोक मूर्तिपूजक नाहीत. त्यांच्यात एखाद्या दगडाला त्या देवाचं प्रातिनिधिक रूप मानलं जातं. ज्या ठिकाणी हे युद्ध झालं तिथं एका झाडाखाली ‘तारू’ देवाची स्थापना करण्यात आली. या लोकांनी त्या देवाला नाव दिलं ‘तारुबा’. अजूनही गेली शेकडो वर्षं या देवाला इथल्या आदिवासी लोकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त नावाचा अपभ्रंश झाला आणि नाव झालं ‘ताडोबा’!

तारूच्या या भूमीवरचं जंगल आजही त्याच्या नावानं ओळखलं जातं. जंगलाचं नाव आहे ताडोबा जंगल. सन १९५५ ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ म्हणून हे ११६.५४ चौरस किलोमीटरचं जंगल संरक्षित करण्यात आलं. पुढं या जंगलाच्या भोवती असलेल्या जंगलाला सन १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि त्याला नाव दिलं गेलं ‘अंधारी वन्यजीव अभयारण्य’. कालांतरानं सन १९९५ मध्ये हे दोन्ही प्रदेश मिळून नामकरण झालं ‘ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प’. आज ६२५.८२ चौरस किलोमीटरचा ‘कोअर भाग’ आणि ११०१.७७ चौरस किलोमीटरचा ‘बफर भाग’ अशा एकंदरीत १७२७.५९ चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण भागात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे प्रशासकीयदृष्ट्या तीन भाग करण्यात आलेले आहेत. ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा. ‘ताडोबा’ हा जंगलातला उत्तरेकडचा भाग, तर कोळसा हा दक्षिणेकडचा भाग. मोहर्ली हा दोघांच्या मधला भाग. तिन्ही भागांत जंगल वेगवेगळं आहे हे ताडोबाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कोळसा आणि ताडोबा या भागांत गवताळ कुरणं जास्त प्रमाणावर आहेत, तर मोहर्ली या भागात बांबूचं प्राबल्य अधिक.

अन्न आणि पाणी यांची मुबलकता यांमुळे अशी विविधता ताडोबात पाहायला मिळते. ताडोबा, मोहर्ली, कोळसा या तिन्ही क्षेत्रांत तीन मोठे तलाव आहेत. ताडोबा आणि कोळसा या भागांत ब्रिटिशांच्या काळात साधारणतः सन १९०४ मध्ये बांधलेली विश्रामगृहं आहेत. या विश्रामगृहांच्या जवळच दोन मोठे तलाव आहेत, तर मोहर्ली भागात तेलिया धरणामुळे तयार झालेला तलाव आहे. याशिवाय पांढरपौनी तलाव नंबर १ व २, जामनी, ९७ नंबर पाणवठा, जामूनझोरा, चिखलवाही, आंबेबोडी, वसंत बंधारा, काटेझरी, उदर मटका, अस्वलहिरा, आंबेदोबाड, रायबा, कुवानी, ऐनबोडी, पंचधारा असे बारमाही पाणी असणारे छोटे-मोठे तलाव ताडोबात आहेत. जामूनबोडी, शिवणझरी असे अगदी हिवाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी टिकून राहणारे तलावही इथं आहेत. या सगळ्या तलावांमध्ये पाण्याची क्षमता वाढावी आणि पाणी अगदी मे महिन्याच्या अखेरपर्यंत टिकून राहावं यासाठी वन विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय जंगलात अनेक ठिकाणी मानवनिर्मित पाणवठे वन विभागानं निर्माण केलेले आहेत. फक्त रस्त्यालगत असणारे पाणवठे वन विभागानं आतल्या बाजूला हलवले आहेत.

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जामनी तलावात उगम पावणारी आणि मूलकडे वाहणारी अंधारी ही नदी अनेक वन्यप्राण्यांची जीवनदायिनी आहे. या तलावांची, इथल्या काही भागांची नावंही गमतीदार आहेत. बोडी म्हणजे छोटा तलाव. तलावाकाठी ऐनाची झाडं आहेत म्हणून त्याला नाव पडलं ऐनबोडी. गंमत म्हणजे ऐनबोडी नावाचे तीन तलाव ताडोबात आहेत. ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा या तिन्ही विभागांत प्रत्येकी एक. जांभळाची अनेक झाडं काठावर असल्यामुळे नाव मिळालं जामूनबोडी, आंब्याची झाडं खूप असणाऱ्या तलावाला आंबेबोडी. पाण्याच्या पाटाच्या बाजूला आंब्याची झाडं खूप म्हणून नाव मिळालं आंबेपाट. काटेरी झुडपाच्या बाजूला एक नैसर्गिक झरा वाहतो म्हणून त्या भागाला नाव पडलं काटेझरी. एका भागातल्या आंब्याच्या झाडावरचे आंबे काळे पडले त्या भागाला नाव मिळालं काळा आंबा! एका भागातले आंबे आंबट निघाले म्हणून आंबटहिरा! जामूनझोरा, शिवणझरी, आंबेउतार, अस्वलहिरा, अस्वलटोक, सांबऱ्यापाट, अंधारी नदीतला वाघडोह, वाघनाला, वाघदरी, पंचधारा असे अनेक भाग त्यांच्या नावावरून त्यांचं वैशिष्ट्य दर्शवतात.

वन विभागाच्या प्रयत्नांनी बफर झोनमध्येही पर्यटन सुरू करण्यात आलं. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. बफर झोनमध्ये चालणाऱ्या पर्यटनात इतर व्याघ्रप्रकल्पांना ताडोबानं केव्हाच मागं टाकलंय. याचं कारण बफर झोनमध्ये सहजतेनं होणारं व्याघ्रदर्शन हे आहे. वाघांची संख्या वाढली ही गोष्ट एकाअर्थी चांगली आहे; पण हे दुधारी तलवारीसारखंही आहे. वाघ हा हद्द घोषित करणारा प्राणी आहे, त्यामुळे एखाद्या जंगलात किती वाघ राहू शकतात याचं गणित ठरलेलं आहे. त्या संख्येच्या वर वाघ वाढले की साहजिकच वाघ जंगलाच्या बाहेर पडतात. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी जंगल असणारे काही विशिष्ट भाग राखून ठेवलेले असतात. त्यांना ‘कॉरिडॉर’ असं म्हणतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे हे ‘कॉरिडॉर’ कमी व्हायला लागले आहेत. जंगलाचं क्षेत्रही काही ठिकाणी कमी व्हायला लागलं आहे. असं झालं की सुरू होतो मानव आणि वन्यप्राणी यांच्यातला संघर्ष.

ताडोबानं मला कायमच भुरळ घातली आहे. विस्तीर्ण ताडोबा तलाव, पाण्याच्या इतर जागा, रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेले बांबू, त्यामुळे बांबूचं तोरण बांधल्यासारखे दिसणारे रस्ते, कोळशातल्या लाल मातीच्या रस्त्यावर उमटलेल्या वाघाच्या ठसठशीत पाऊलखुणा, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, मुबलक पाणी....चितळ, सांबर, गव्यांचे बहुसंख्य कळप, विविधता दर्शवणारं पक्षीवैभव, मोहर्ली प्रवेशद्वार ते ताडोबा विश्रामगृहापर्यंतचा डांबरी रस्ता आणि त्यावर होणारं व्याघ्रदर्शन, काटेझरी परिसरातलं घनदाट जंगल; एक प्रकारची गूढता भरून राहिलेला वाघडोहाचा परिसर या सगळ्यानं माझ्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. 

गेली अनेक वर्षं मी ताडोबात येतोय; पण तरीही मला ताडोबा जंगल संपूर्ण कळलं असं मी चुकूनही म्हणणार नाही. प्रत्येक भेटीत नवीन अनुभव देणारं हे जंगल मला प्रत्येक वेळी त्याचं नवीन रूप दाखवतं. मग त्यापासून नवीन काहीतरी शिकायला मिळतं. निसर्ग आपल्याला कायम भरभरून देत असतो. ‘देणारा तो आणि घेणारे आपण’ हे सूत्र ज्यानं जाणलं तो त्यातून काहीतरी शिकला. सढळ हातांनी आपण त्याचं हे देणं स्वीकारलं की आपली ओंजळ कधीही रिक्त राहणार नाही. ओंजळ घट्ट धरण्याची जबाबदारी आपली. एकदा का ते ओंजळीतून निसटलं की मातीमोल होईल आणि मागं उरेल ती फक्त माती...!

कसे जाल? 
1) पुणे-नागपूर-चंद्रपूर-ताडोबा/ पुणे-नागपूर-चिमूर-ताडोबा  
2) भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?  
सस्तन प्राणी :
मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, ससा, वानर, रानकुत्रे, चांदी अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा-घुबड, गव्हाणी घुबड, धनेश, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, नवरंग, सुतारपक्षी.
सरपटणारे प्राणी : मगर, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस.
वृक्ष : साग, ऐन, अर्जुन, बेहडा, बिजा, भेरा, बोर, बेल, चिचवा, धावडा, कुसुम, मोह, मोवई, सालई, करू, सावर, शिसम, शिवण, सूर्या, तेंदू.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

चला, जबाबदार प्रवासी होऊ या!

 

The ‘traveller’ is active; he/she goes strenuously in search of people, of adventure, of experience. The ‘tourist’ is passive; he/she expects interesting things to happen to him/her. He/she only goes “sight-seeing,” असं अमेरिकी इतिहासकार डॅनियल बूर्स्टिन म्हणायचा. टूरिस्ट (पर्यटक) होण्यापेक्षा मलाही ट्रॅव्हलर (प्रवासी) होणंच नेहमी आवडलं. दोहोंतला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे  आणि आपल्या आजूबाजूलादेखील ‘ट्रॅव्हलर कम्युनिटी’ तयार व्हावी असंच मला नेहमी वाटत राहतं. लोकांना भेटणं, मैत्री करणं, गप्पा मारणं, विचारांची देवाण-घेवाण करणं, संस्कृती समजून घेणं अन् स्वानुभवानं आयुष्य समृद्ध करणं हे ‘पर्यटका’पेक्षा एखाद्या ‘प्रवाशा’ला अधिक चांगल्या प्रकारे जमतं.

आयुष्यात आपण सारेच ‘पर्यटक’ म्हणून कधी ना कधी फिरत असतो. आपण जेव्हा केव्हा फिरायला जातो तेव्हा ठरावीक पद्धतीनं, ठोकळेबाज पद्धतीनंच सगळं पाहतो; पण हळूहळू आपण जर ‘प्रवासी’ म्हणून फिरू लागलो तर आपण अधिक प्रगल्भ होतो. आपण गोष्टी विचारपूर्वक करू लागतो; मग प्रवास अर्थपूर्ण होऊ लागतो असं मला वाटतं आणि तिथून पुढं आपली पावलं ‘रिस्पॉन्सिबल टूरिझम’ म्हणजेच जबाबदार पर्यटनाकडे पडू लागतात.

आपण फिरताना अधिक जबाबदारीनं व सुसंस्कृतपणे वागणं म्हणजेच जबाबदार पर्यटन होय! आपण सारेच आपापल्या परीनं जबाबदार पर्यटनाला हातभार लावू शकतो. ते कसं? तर ते असं :

  • आपण प्रवासी काहीच दिवसांसाठी पर्यटनस्थळी जात असतो, त्यामुळे स्थानिक लोकांच्या चाली-रीतींचा आदर करून त्यांच्या नियमांनुसार आपण वागायला हवं.
  • शासकीयदृष्ट्या पर्यटनधोरण ठरवताना स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानला गेला पाहिजे.
  • आपल्याकडून नैसर्गिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक वारशाचं नुकसान होणार नाही याची दक्षता प्रवाशांनी घेतली पाहिजे.
  • स्थानिक लोकांशी अधिक अर्थपूर्ण संवाद साधत तिथल्या सांस्कृतिक-सामाजिक-पर्यावरणविषयक समस्यांविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यासंदर्भात सकारात्मक मदत केली पाहिजे, तर प्रवास आनंददायक होईल.
  • स्मारकं, धार्मिक स्थळं व इतर सर्वच पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापकांनी ज्या त्या जागा शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी प्रवेश करण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • कुठलीही वास्तू बघताना आपण संवेदनशीलपणे वागलं पाहिजे व आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही असं वर्तन केलं पाहिजे.
  • सुंदर पर्यटनस्थळं पुढच्या पिढीला बघता यावीत यासाठी आपण अधिक जबाबदारीनं वागून काळजी घेतली पाहिजे. 
  • It is our responsibility to pass on the pride & heritage to the next generation.
  • स्थानिक लोकांना अधिक रोजगार कसा निर्माण होईल याचा विचार सतत केला पाहिजे.  

या व यांसारख्या इतर बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास प्रवास अजून सुखकर होईल व पर्यटनस्थळांचं नुकसान होणार नाही, खऱ्या अर्थानं वारशाचं जतन होईल व पुढच्या पिढीला तो बघता येईल. जगभरात काही प्रवासी कंपन्या, काही शासनकर्ते, काही स्थानिक लोक हे जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देताना दिसतात व त्यासाठी कष्ट घेतात. या साऱ्यांचं आपण वेळोवेळी कौतुक केलं पाहिजे. त्यांचे आभार मानले पाहिजेत. अशाच काही देशांबद्दल व तिथल्या योजनांबद्दल मला थोडं सांगायचंय...

भूतानच्या पर्यटन -उपक्रमांमुळे तो देश जगातल्या ‘सर्वोच्च जबाबदार आणि शाश्वत पर्यटनस्थळां’मध्ये समाविष्ट झाला आहे यात काहीच शंका नाही. उर्वरित जग अधिक जागतिकीकरणाच्या मागं लागलं असताना भूताननं मात्र आपली संस्कृती जपण्यास प्राधान्य दिलं आहे. भूतानमध्ये फिरताना काही प्रमाणात ‘प्रवासकर’ घेतला जातो, त्याचा पर्यावरणासाठी उपयोग होतो. भूतान हा देश इतिहास-संस्कृती-नैसर्गिक सौंदर्य आदी बाबींनी समृद्ध आहे, हा त्यांचा ‘बोनस’ आहे; पण तेवढ्यावरच न थांबता तिथलं सरकारही पर्यटनविषयक सकारात्मक पावलं टाकताना दिसतं. भूतान हा देश छोटा जरी असला तरी तो ‘रोल मॉडेल’ असून त्याचा उल्लेख ‘जगातला सर्वात आनंदी-सुखी देश’ असा होतो.

इंडोनेशियातलं सुमात्रा हे अनेक बेटांपैकी सर्वात रोमांचक आणि वैविध्यपूर्ण आहे. शक्तिशाली ज्वालामुखी आणि ‘व्हर्जिन रेनफॉरेस्ट्स’पासून ते लपवलेले समुद्रकिनारे आणि भाताच्या शेतीपर्यंत, तसंच प्राचीन मंदिरांपासून ते रसरशीतपणानं ओतप्रोत असलेल्या स्फूर्तिदायक संस्कृतीपर्यंत सुमात्रामध्ये सर्व काही आहे. एवढा विपुल असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा असूनही या बेटाचं नाव लोकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये क्वचितच असतं. उत्तर सुमात्रातली ग्रीन हिल, पश्चिम सुमात्रातलं रिंबा इकोलॉज, तसंच विविध डोंगर व जंगलं ही ठिकाणं तिथं बघण्यासारखी आहेत. जवळपासची जंगलं आणि अखंड समुद्र अशा नैसर्गिकतांमुळे तिथल्या रहिवाशांचं आरोग्य निरोगी असावं असं मला वाटतं. इथं जाणं म्हणजे जबाबदार पर्यटनाला हातभार लावणं आहे.

तिकडे दक्षिण अमेरिकेतही अब्जाधीश उद्योजक डग टॉम्पकिन्स व चिली सरकार यांच्या काममुळे आणि गुंतवणुकीमुळे चिली देशातला बहुतेक वाळवंटी भाग आता संरक्षित झाला आहे. पॅटागोनियन लॅंडस्केप्सची शिखरं हे तिथलं प्रमुख आकर्षण राहिलेलं आहे. सन २०१८ मध्ये ‘ रूट ऑफ द पार्क्स’ ची निर्मिती झाल्यामुळे दोन हजार ८०० किलोमीटर जमीन ही संरक्षित भूमी म्हणून घोषित करून तिथं राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे प्यूमा आणि नंदू (इमूचा एक प्रकार) यांसह काही पशू-प्राण्यांचा तो अधिवास झाला आहे. याशिवाय ‘द मापुचे’ या आदिवासी लोकांनी त्यांची दारं पर्यटनासाठी खुली केली आहेत. या जमातीनं त्यांच्या पद्धतीची घरं, त्यांची खाद्यसंस्कृतीही पर्यटकांसाठी खुली केली आहे. त्यामुळे तिथं मोठा रोजगार निर्माण झाला आहे. इंग्लिश बोलणारे गाईडही तिथं सहज उपलब्ध होतात.

कोलंबिया, केनिया, पलाऊ, जर्मनी, लाओस, कोस्टा रिका आदी देशांनी ‘जबाबदार पर्यटन’च्या दिशेनं पावलं टाकली, त्यामुळे तिथल्या पर्यावरणाचंही संरक्षण होत आहे आणि स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे. आपण जगभर फिरत असताना काही शिष्टाचार पाळले तर चांगल्या जगाच्या निर्मितीमध्ये आपलाही सहभाग असेल याचं समाधान तर वाटेलच; परंतु आपण जबाबदार पर्यटनाकडून शाश्वत पर्यटनाकडे वाटचाल करू लागलो आहोत याचा वेगळाच आंतरिक आनंदही आपल्याला मिळेल.
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

प्रज्ञेश मोळक

 

 

 

 

दुधवाच्या तराईच्या जंगलात

 

भारताला आसेतुहिमाचल जैवविविधता लाभली आहे. भारतात प्रत्येक भागाचं नैसर्गिक सौंदर्य आणि महत्त्व वेगळं आहे. प्रत्येक जंगलाची खासियत आहे; पण उत्तर भारतातल्या जंगलांमध्ये डोकावून पाहिलं तर लगेच लक्षात येतं की निसर्गदेवतेनं इथं आपला खजिना खरोखरच रिता केला आहे. उत्तर प्रदेशातली कित्येक जंगलं अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेली आणि समृद्ध आहेत. जिम कॉर्बेटच्या अनेक पुस्तकांतून वर्णन असणाऱ्या उत्तराखंडानं (पूर्वीचा उत्तर प्रदेशाचा भाग) माझ्या मनावर लहानपणापासूनच गारुड केलं होतं. त्यामुळे एकदा तरी या भागाला भेट द्यायची असं ठरवलं होतं. पुढं मी ‘जिम कॉर्बेट व्याघ्रप्रकल्पा’ला अनेकदा भेट दिली. भारताच्या आणि नेपाळच्या सीमेलगत असणारा उत्तर प्रदेशातला ‘दुधवा व्याघ्रप्रकल्प’ही आपल्या निसर्गवैविध्यानं मला अनेक वर्षं खुणावत होता.

भारताच्या उत्तर भागातली तराईप्रदेशातली जंगलं समृद्ध म्हणावी लागतील. डोंगररांगा, सपाट मैदानं, पाणी अशा निरनिराळ्या अधिवासांमुळे तराईभागातल्या जंगलांत जैवविविधता खूप आढळते.

हिंदी भाषेत तराईचा अर्थ ‘ओला’ असा होतो. उत्तर भारतातल्या हिमालयाच्या पायथ्याशी असणारी दलदलीची मैदानं ही तराईवनांमध्ये मोडतात. या तराईवनांमध्ये समावेश असणाऱ्या तेरा राखीव क्षेत्रांपैकी पाच राखीव क्षेत्रं उत्तर प्रदेशात आहेत. ती म्हणजे, दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य, कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य, सोहेलवा वन्यजीव अभयारण्य, सोहागी बरवा वन्यजीव अभयारण्य.

लखीमपूर खेरी आणि बहराईच या जिल्ह्यांतल्या दुधवा व्याघ्रप्रकल्पात दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य या संरक्षित क्षेत्रांचा समावेश होतो. सुमारे ८८३ चौरस किलोमीटर क्षेत्रात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला असून, पिलिभितसारख्या अनेक महत्त्वाच्या जंगलांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा व्याघ्रप्रकल्प आहे. उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या नेपाळ या देशातली अनेक जंगलंही दुधवामुळे भारतातल्या जंगलांशी जोडली गेली आहेत. संपूर्ण तराईभाग हा हत्ती आणि एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध असला तरी आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यासाठीही दुधवा हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तो वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे ‘बाराशिंगा. भारतात आढळणाऱ्या Rucervus duvaucelii duvaucelii, Rucervus duvaucelii ranjitsinhi, Rucervus duvaucelii brander या तीन उपजातींच्या बाराशिंग्यांपैकी Rucervus duvaucelii duvaucelii  या उपजातीचा बाराशिंगा दुधवामध्ये आढळतो. सन १९५८ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेल्या या संरक्षित क्षेत्राला ‘सोनारीपूर अभयारण्य’ म्हटलं जाई. पुढं सन १९८८ मध्ये वरील तीन क्षेत्रांना मिळून व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाल्यावर ‘दुधवा’ हे नाव पडलं.

व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि दक्षिणसीमेवर मोहन आणि सुहेली या नद्या आहेत, तर व्याघ्रप्रकल्पातली प्रमुख नदी आहे.

शारदा. किशनपूर अभयारण्य आणि दुधवा राष्ट्रीय उद्यान यांदरम्यान वाहणाऱ्या या नदीला पावसाळ्यात मोठा पूर येतो. पावसाळ्यात तीन ते सहा मीटर उंचीचं वाढणारं ‘हत्तीगवत’ हे दुधवा व्याघ्रप्रकल्पाचं वैशिष्ट्य. यामुळे एकशिंगी गेंड्यांची संख्याही दुधवामध्ये चांगल्या प्रमाणावर आहे. ‘मुबलक पाणी’ हे तराईजंगलांचं मुख्य वैशिष्ट्य असतं. मोठ्या संख्येनं असलेले तलाव आणि खाद्याची उपलब्धता यांमुळे दुधवामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते.

सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या मैदानात पूर्वी मोठ्या प्रमाणावर एकशिंगी गेंडे आढळत असत. जगातल्या या चौथ्या सर्वात मोठ्या सस्तन वन्यप्राण्याची मोठ्या प्रमाणावर झालेली अवैध शिकार आणि या भागात झालेली बेसुमार जंगलतोड यांमुळे सन १८७८ च्या दरम्यान दुधवामधून एकशिंगी गेंडा नामशेष झाला. पुढं सन १९८४ मध्ये आसामच्या पोबितोरा वन्यजीव अभयारण्यातून सहा, तर नेपाळच्या ‘रॉयल चितवन राष्ट्रीय उद्याना’तून चार एकशिंगी गेंडे दुधवामध्ये आणण्यात आले. 
संवर्धनासाठी वनविभागानं केलेले प्रयत्न आणि संरक्षण यांमुळे आज दुधवामध्ये या प्राण्याची संख्या चांगल्या प्रमाणावर आढळून येते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या गवताळ प्रदेशामुळे ‘बेंगाल फ्लोरिकन’ नावाचा दुर्मिळ पक्षीही दुधवामध्ये आढळतो. वाघांची आणि हत्तींची चांगली संख्या हे या व्याघ्रप्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य. कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्यात सन १९७७ मध्ये सुरू करण्यात आलेलं ‘सुसर पुनर्वसन केंद्र’ आहे.

या सर्व संरक्षित क्षेत्रांलगतच्या भागात ‘थारू’ जमातीचे आदिवासी लोक राहतात. ही उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. उत्तर प्रदेशातल्या एकूण आदिवासी लोकसंख्येच्या ३३ टक्के या जमातीचे लोक राज्यात आहेत. 

दुधवा व्याघ्रप्रकल्पाच्या इतिहासात एका व्यक्तीचं नाव आदरानं आणि अग्रक्रमानं घ्यावं लागेल व ते म्हणजे बिली अर्जनसिंह. ‘शिकारी ते वन्यजीवांचे रक्षक’ हा त्यांचा प्रवास अविस्मरणीय आहे. प्राणिसंग्रहालयातले वाघ आणि बिबटे यांचं जंगलात पुनर्वसन करण्याचा आणि त्यांना पुन्हा ‘रानटी’ करण्याचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीयच. ‘दुधवा व्याघ्रप्रकल्पाचे प्रणेते’ अशीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या आग्रहामुळे भारताच्या माजी पंतप्रधान आणि ‘प्रोजेक्ट टायगर’च्या प्रणेत्या इंदिरा गांधी यांनी दुधवाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा दिला. 

काही अभ्यासकांच्या मते, मार्जारकुळातल्या प्राण्यांना शिकार करणं आईकडून शिकवलं जातं. अतिशय लहान वयात ही पिल्लं अनाथ झाली तर आईनं शिकार करणं शिकवलेलं नसल्यामुळे त्यांना स्वतःहून शिकार करता येत नाही, त्यामुळे त्यांना उर्वरित आयुष्य एक तर प्राणिसंग्रहालयात घालवावं लागतं अथवा ही पिल्लं मरण पावतात. तारा नावाच्या इंग्लंडमधल्या प्राणिसंग्रहालायातून आणलेल्या वाघिणीवर बिली अर्जनसिंह यांनी केलेला यासंदर्भातला प्रयोग खूपच गाजला होता. 

विस्तीर्ण गवताळ प्रदेश, दलदलीचा भूभाग, अनेक छोटे-मोठे तलाव, नद्या, जागोजागी वाढलेले मोठमोठे सालवृक्ष, उंच वाढलेलं हत्तीगवत, मुसळधार पाऊस, कुडकुडायला लावणारी थंडी या सगळ्यामुळे दुधवा या तराईजंगलाचं सौंदर्य  अधिकच खुलवलं आहे. 

कसे जाल? : पुणे/मुंबई-लखनौ-लखीमपूर-दुधवा
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : डिसेंबर ते मार्च 

काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी :
सुमारे ३८ प्रजाती. वाघ, बिबट्या, हत्ती, बाराशिंगा, सांबर, चितळ, भेकर, एकशिंगी गेंडा, मुंगूस, वानर, लालतोंडी माकडं, नीलगाय, अस्वल, हॉग डिअर.

पक्षी : सुमारे चारशेहून अधिक प्रजातींचे पक्षी. Swamp Partridge, Bengal Florican, Pied Hornbills, Brahminy Ducks, White necked storks, Pintails, Lesser Whistling Teals, Bronze winged jacana, Mallard, Tufted Pochard, River Lapwing.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, सुसर, धामण, नाग, घोणस, हिमालयन पिट वायपर, मण्यार,  दिवड, वाळा, कुकरी, रसेल कुकरी, मांजऱ्या, घोरपड.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

कुद्रेमुख : शोला जंगल!

 

आपण आजपर्यंतच्या लेखांमधून मध्य आणि उत्तर भारतातील जंगलांची माहिती घेतली. आज आपण भारताच्या तितक्याच; किंबहुना कांकणभर जास्त सुंदर असणाऱ्या दक्षिण भागातील एका जंगलाची माहिती घेऊ या. हे जंगल म्हणजे ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान.’ कानडी भाषेतल्या कुद्रेमुख या शब्दाचा अर्थ आहे घोड्याचं तोंड. 

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातील राज्यांत अनेक व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यं आहेत. त्यांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, पक्षी आढळून येतात. पश्चिम घाटाची तटबंदी लाभल्यामुळे दक्षिण भारतातल्या या जंगलांचं सौंदर्य अजूनच खुललं आहे. ‘कुद्रेमुख’ (जिल्हा : चिकमगळुरू) हा या अशा सुंदर जंगलांच्या कोंदणातला हिरा आहे!

भारतातील एकूण वाघांच्या संख्येत कर्नाटक राज्य अनेक वर्षं अग्रेसर होतं. आताच्या गणनेनुसार, अग्रस्थानी असणाऱ्या मध्य प्रदेशाखालोखाल वाघांच्या संख्येबाबत कर्नाटकचाच क्रमांक लागतो. कर्नाटकात व्याघ्रप्रकल्पांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या अभयारण्यांत आणि राष्ट्रीय उद्यानांत वाघ आढळतात, त्यामुळे या राज्यातील सर्वच जंगलांना वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वाघाबरोबरच आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण सस्तन प्राण्याचा वावर कुद्रेमुखमध्ये आढळतो व तो प्राणी म्हणजे ‘सिंहपुच्छ माकड’ अर्थात् Lion-tailed macaque. 

केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या माकडाच्या या उपजातीचा वावर हे कुद्रेमुखचं वैशिष्ट्य; किंबहुना याच प्राण्याच्या संरक्षणासाठी या राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सुप्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उल्हास कारंथ यांनी सन १९८३-८४ मध्ये या जंगलभागाचा अभ्यास केला तेव्हा त्यांना सिंहपुच्छ माकडाचा वावर या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळून आला. कर्नाटकच्या पश्चिम घाटाच्या भागातील या जंगलात सर्वात जास्त संख्येनं सिंहपुच्छ माकडं असल्याची नोंद त्यांनी केली. ‘या माकडांचं संरक्षण आणि संवर्धन या मुद्द्यावर भर दिल्यास जंगलातील इतर जैवविविधतेचंही आपोआप रक्षण होईल,’ असं त्यांनी अहवालातून सुचवलं. डॉ. कारंथ यांचं नाव व्याघ्रसंवर्धनासंदर्भातही आदरानं घेतलं जातं. व्याघ्रगणनेसाठी सध्या वापरण्यात येणारी क्रांतिकारी आणि अचूक अशी ‘कॅमेरा-ट्रॅप’पद्धत ही डॉ. कारंथ यांनीच शोधली आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, या जंगलाला संरक्षण देण्याविषयी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळानं राज्य सरकारला सुचवलं. त्यानुसार, कर्नाटक सरकारनं सन १९८७ मध्ये सुमारे ६००.३२ चौरस किलोमीटरच्या या जंगलाला ‘राष्ट्रीय उद्यान’ म्हणून मान्यता दिली. आजही ही सिंहपुच्छ माकडं कुद्रेमुखमध्ये मोठ्या संख्येनं आढळतात. या माकडाच्या दोन्ही गालांवर व कपाळाच्या वरच्या बाजूला (चेहऱ्यावर वर्तुळाकार) करड्या व पांढऱ्या रंगाच्या केसांचे पुष्कळ झुबके असतात, तसंच त्याच्या शेपटीच्या टोकाला सिंहाच्या शेपटीसारखा केसांचा झुबका असतो, त्यामुळे त्याला ‘सिंहपुच्छ माकड’ असं म्हटलं जातं. नरामध्ये शेपटीच्या केसांचा झुबका जास्त लांब आणि जाड असतो. केरळमध्येही या माकडांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याची नोंद आहे.

सदाहरित जंगल हे कुद्रेमुखचं वैशिष्ट्य; पण हे जंगल नुसतंच हिरवंगार नाही. या परिसरातल्या जंगलाला ‘शोला जंगल’ असंही म्हणतात. शोला जंगल म्हणजे दोन दऱ्यांमध्ये अडकलेलं जंगल. या अशा जंगलात झाडांबरोबरच आजूबाजूला गवताळ मैदानंही असतात. दोन डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे इथल्या जंगलातली झाडं, वेली, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचणार नाही अशी उंच झाडं काही परिसरात आहे. ही झाडं आणि अतिशय मोठमोठ्या वेली यांमुळे इतर जैवविविधताही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुद्रेमुखजवळ असणाऱ्या ‘अगुंबे’ या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे या ठिकाणी अप्रतिम असं वर्षावन निर्माण झालं आहे. जगातील सर्वात लांब असा विषारी साप म्हणजेच ‘नागराज’ अर्थातच किंग कोब्रा हे या ठिकाणचं वैशिष्ट्य. हा जहाल विषारी साप हा घरटं तयार करणारा एकमेव साप आहे.

चिकमगळुरू, उडपी आणि दक्षिण कन्नड या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ‘कुद्रेमुख राष्ट्रीय उद्याना’चा आकार हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. कानडी भाषेतल्या कुद्रेमुख या शब्दाचा अर्थ घोड्याचं तोंड. कर्नाटक राज्यातील ‘मुलयानगिरी’खालोखाल दुसऱ्या सर्वात उंच शिखराच्या (१८९४ मीटर) या डोंगराचा आकार घोड्याच्या तोंडासारखा दिसतो. तुंग, भद्रा आणि नेत्रावती या नद्या ‘कुद्रेमुख’च्या जीवनवाहिनी आहेत. पुढं शिमोगा जिल्ह्यातील ‘कुडली’ या ठिकाणाजवळ तुंग आणि भद्रा या नद्यांचा संगम होतो आणि त्यांची ‘तुंगभद्रा’ नदी होते. कुद्रेमुख जंगलातील ‘गंगमुला’ या ठिकाणी या तिन्ही नद्यांचा उगम होतो. हे ठिकाण पाहण्यासारखं आहे. 

तसंच हनुमानगुंडी, कदंबी धबधबा, श्रृंगेरी ही या जंगलातील भेट देण्यासारखी ठिकाणं. कुद्रेमुख, केरकाते, कलासा आणि शिमोगा या चार भागांत विभागल्या गेलेल्या या राष्ट्रीय उद्यानात ‘भगवती नेचर कॅम्प’ नावाचं वनविभागाची सोय असणारं राहण्याचं ठिकाण आहे. याशिवाय श्रृंगेरी, कलासा इथंही राहण्याची सोय आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच येथे असणाऱ्या अनेक ट्रेकिंग-पॉईंट्सवर ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो.

कुद्रेमुखला एखाद्या निसर्गवेड्याचा कस लागतो. सूर्यप्रकाशही सहजासहजी न पोहोचणाऱ्या हिरव्यागार घनदाट जंगलात, डोंगर-दऱ्यांतून फिरताना एखाद्याच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. आजूबाजूच्या झाडा-झुडपांवर असणाऱ्या जळवा आपल्या शरीराचा कधी वेध घेतील याचा काही नेम नसतो. मात्र, या सगळ्याची सवय करून घेतली की कुद्रेमुखमध्ये फिरण्यासारखं दुसरं सुख नाही. सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, वृक्ष, वेली अशा विविधतेचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी कुद्रेमुख हे सुयोग्य ठिकाण. कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’ हा खरं तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा खरा स्रोत. पाण्याच्या व्यवस्थापनाचा अद्भुत नैसर्गिक कारखाना असणाऱ्या या शोला जंगलातील काही वनस्पती, प्राणी, पक्षी जगात कुठंही आढळत नाहीत. विविध कारणांमुळे ही जंगलं कमी होत चालली आहेत आणि हा आपल्यासमोरचा खरा धोका आहे. शाश्वत विकासासाठी कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’ वाचवणं हेच आपलं प्राथमिक उद्दिष्ट असायला हवं. जगाला भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगसारख्या धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी कुद्रेमुखसारखी ‘शोला जंगलं’च निर्णायक अस्त्र म्हणून उपयोगी पडतील. 

कसे जाल? : पुणे-उडपी/मंगळूरू-कुद्रेमुख
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी :
सुमारे ४२ प्रजाती. वाघ, बिबट्या, गवे, सिंहपुच्छ माकड, लाजवंती (स्लेंडर लॉरिस), रानमांजर, लेपर्ड कॅट, अस्वल, हत्ती, शेकरू.

पक्षी : सुमारे २५४ हून अधिक प्रजातींचे पक्षी. Blossom Headed Parakeet, Blue Winged Parakeet, Indian Lorikeet, Great Pied Hornbill, Frog Mouth, Long Tailed Nightjar, Malabar Trogon, Black Capped Kingfisher, Stork Billed Kingfisher, Indian Great Black Woodpecker, Spotted Babbler.

सरपटणारे प्राणी : सुमारे ५२ हून अधिक प्रजाती. Brook''s House Gecko, Northern Spotted Gecko, Indian Rock Python, Buff-Striped Keelback, King Cobra,, Hump-Nosed Pit Viper, Malabar Pit Viper.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...