Tuesday, November 30, 2021

भाउ दाजी लाड म्युझीयम गतस्मृती मुंबईच्या...

 प्रत्येक वेळी शनिवार-रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीचा विचार करताना शहराबाहेर जाण्याऐवजी शहराचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जागांनाही प्राधान्यक्रमाने भेटी द्यायला हव्यात. आज आपण अशाच एका जागेला भेट देणार आहोत. ती जागा आहे डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय.

फिरायला जायचं असेल तर प्रत्येक वेळी समुद्रकिनारे, गड-किल्ले किंवा ऐतिहासिक स्थळांनाच भेट द्यायला हवी असं नाही. शहरातही अशा अनेक जागा असतात, त्यांना त्या शहरांमधील नागरिकसुद्धा क्वचितच भेट देतात. वस्तुसंग्रहालये ही या यादीतील सर्वांत दुर्लक्षित ठिकाणं. म्हणूनच तिथे जाऊन काय पाहायचं आणि सुट्टीचा दिवस तिथे का घालवावा, असे प्रश्न अनेकांना पडतात. पण आपले शहर, इतिहास, शोध, कला आणि संस्कृतीची माहिती करून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही वस्तुसंग्रहालये, कलादालनं, प्रदर्शनांना भेटी द्यायला हव्यात.

मुंबईतील राणीची बाग प्रसिद्ध आहे; मात्र राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी १८५७ पासून दिमाखात उभ्या असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाकडे पर्यटकांची पावले क्वचितच वळतात. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकाच्या पूर्वेला अगदी हाकेच्या अंतरावर हे वस्तुसंग्रहालय आहे. कलाप्रेमी आणि अभ्यासकांना ही जागा नवीन नाही; मात्र शहरातील नागरिकांनीही आवर्जून पाहावं आणि पुन्हा पुन्हा भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे. इटालियन रेनेसान्स शैलीचं बांधकाम असलेलं हे वस्तुसंग्रहालय पूर्वी ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम’ नावाने ओळखलं जायचं, पण १९७५ मध्ये संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं.

‘बॉम्बे’ ते ‘मुंबई’ शहर असा प्रवास पाहणारं हे शहरातील सर्वांत जुनं आणि कोलकाता, चेन्नईनंतर देशातलं तिसरं वस्तुसंग्रहालय आहे. वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत प्रवेश करण्याआधी आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे घारापुरी लेण्यांमधला प्रचंड दगडी हत्ती आणि तोफ. मजबूत दगडी बांधकाम असलेल्या भव्य इमारतीच्या पायऱ्या चढून आत प्रवेश करताच एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटतं. सोन्याचा वर्ख असलेल्या एका समान रेषेत दोन बाजूंना असलेल्या १२ खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेलं रंगीत छत नजरेत भरतं.

तळमजल्यावर समोरच असलेला अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससूनचे पुतळे लक्ष वेधून घेतात. आकर्षक मांडणी केलेल्या तळमजल्यावरील कलादालनात प्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेल्या नक्षीयुक्त वस्तू, लाकूड, शंख-शिंपल्यावरील कलाकुसर, आकर्षक माती-धातूची भांडी आणि अनेक धातूंच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. तळमजल्यावर उजव्या हाताला असलेल्या एका छोट्या सभागृहात १९ व्या शतकातल्या चित्राकृती आहेत. वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचं दृक्‌श्राव्य सादरीकरण येथे पाहता येतं.

वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी दगडी पायऱ्यांचा प्रशस्त जिना आहे. जिन्याच्या मध्यावरील दालनात जमशेठजी जीजीभॉय, जगन्नाथ नाना शंकरशेठ, भाऊ दाजी लाड या भारतीयांबरोबर काही ब्रिटिश अंमलदारांचीही तैलचित्रे लावण्यात आलेली आहेत. मधोमध मोकळी जागा असलेल्या या कलादालनाला लोखंडी कठडे आहेत. मुंबईकरांना सर्वाधिक जिव्हाळ्याचं वाटेल अशा ‘मुंबईतलं लोकजीवन’ नावाच्या दालनात मुंबईचे वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या अनेक जात, धर्म, पंथांच्या लोकांच्या पारंपरिक पोशाखातील मातीच्या छोट्या बाहुल्या येथे ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई औद्योगिक बंदर म्हणून विकसित होतानाची जहाज व्यवसायाची स्थित्यंतरं, पारसी समाजाची स्मशानभूमी, ग्रामीण जीवन, जुन्या काळातील भारतीय घरगुती खेळ, चिलखतधारी योद्धा, अनेक वाद्यं, नृत्यशैली आणि मातीच्या नकाशांमधून मुंबईचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कमलनयन बजाज कलादालनात मुंबईतल्या कापड गिरण्या व त्याचा परिसर, कपड्यांवरील कलाकुसर, जुनं लोअर परळ रेल्वेस्थानक आणि दुर्मिळ असा बिडाचा जिना पाहायला मिळतो.

पेशव्यांच्या प्रतिनिधींनी तयार केलेला मुंबई परिसराचा नकाशा (१७७०), जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधला सिरॅमिकच्या मातीच्या भांड्यांचा नमुना, एकोणिसाव्या शतकात लंडनहून पश्चिम आशिया आणि भारतमार्गे ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणाऱ्या जहाजाचा नमुना, समुद्राच्या तळातून गाळ काढणाऱ्या ड्रेजर ‘कूफूस’ (१९१४) या यंत्राचा नमुना, युरोपात ‘बाँबे बॉक्स’ म्हणून प्रसिद्ध असलेली हस्तिदंती पेटी अशा कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या अनेक कलात्मक गोष्टी येथे प्रत्यक्ष पाहता येतात. याशिवाय वस्तुसंग्रहालयात वेळोवेळी विविध प्रकारची प्रदर्शने भरवली जातात, ज्यामध्ये ऐतिहासिक आणि समकालीन कला, संस्कृतींना प्राधान्य दिले जाते.

भराभर फेरफटका मारून येऊ म्हणून वस्तुसंग्रहालयात शिरणारी व्यक्ती इथे काही तास सहज रमून जाते आणि नंतर संग्रहालयाचे विक्री केंद्र व त्यासमोरील मोकळ्या जागेत भल्या मोठ्या वृक्षांच्या सावलीत चहा, कॉफीचा आस्वाद घेत शहराची संस्कृती आणि कलेवर चर्चा करण्यात हरवून जाते. इथून बाहेर पडताना मुंबई शहराची एक वेगळी ओळख झालेली असते. गतस्मृतींना उजाळा देणारी ओढ लागून राहते. इथे कितीही वेळ व्यतीत केला, तरी तो पुरेसा वाटत नाही. म्हणून एकदा भेट दिलेली कलासक्त व्यक्ती आपसूकच या वास्तूशी आपलं नातं कायमचं जोडून घेते.


प्रशांत ननावरे

पावनखिंड - सहलीसाठी उत्तम ठिकाण

 मागील आठवड्यात ३ दिवस पावनखिंडीत जाउन आलो. मस्त ट्रिप झाली. पावनखिंड आणि परिसर तर सुंदर आहेच. शिवाय ३-५ दिवसांच्या सहलीसाठी एकदम झक्कास जागा आहे. पावन खिंड (किंवा घोडखिंड) कोल्हापूरनजीक अंबाघाटात आहे. पुण्याहुन कराड - मलकापूर मार्गे अंदाजे चार - साडे चार तास लागतात. पावनखिंडीत २ दिवस मस्त मजा करता येते. एक दिवस पन्हाळ्याला जाउन येता येइल. पन्हाळगड तिथून एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे. मार्लेश्वर देखील एका तासाच्या अंतरावर आहे. शिवाय गणपतीपुळे / रत्नागिरी दोन - अडीच तासात पोचता येते. विशाळगड देखील तासाभराच्या अंतरावर आहे (थोडे कमीच). पण तिथे काही फार पाहण्यासारखे नाही. पन्हाळ्याला गेल्यास गडाबरोबरच तबक उद्यानातही जाता येइल. बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी एक फोटो पोईंट देखील होइल. एका दिवसासाठी चांगली सहल आहे पावनखिंडीपासून.

पावनखिंडीत राहण्यासाठी बर्‍याच जागा आहेत. मागच्या वेळेस (त्याला एक दशक ओलांडुन गेले) आम्ही हॉर्नबिल रिसोर्ट ला राहिलो होतो. चांगले होते. यावेळेस पावनखिंड रिसॉर्टला राहिलो होतो. मला वाटते या परिसरातले सर्वात जुने हॉटेल हेच असावे. इतरही काही ठिकाणे आहेत पण बाकीची महाग आहात. पावनखिंड रिसोर्ट देखील सोयी सुविधांच्या मानाने महागच वाटते.

पावनखिंड रिसोर्ट म्हणजे पुण्याबाहेरच पुणे. ठिकठिकाणी पाट्या. अगदी खोलीत देखील ३-४ पाट्ञा होत्या. रिसोर्टचे संकेतस्थळ म्हणजे तर ठशठशीत पुणेरी बाणा. (https://pawankhind.in/). म्हणजे सूचना देण्याची देखील एक फार स्पष्ट पद्धत आहे. वेबसाईट वाचल्यावर लक्षात येइलच. वानगीदाखल बोलायचे झाल्यास काही प्रश्न असल्यास मालकांनी वेबसाइटवर त्यांच्या नंबर दिला आहे. पण अगदी लगेच सांगितले आहे की फोन दिला आहे म्हणून लगेच उचलून फोन करु नका. संकेतस्थळावर सगळी माहिती आहे. (आणि आम्हाला फुकट त्रास देउ नका हे आपल्याला लिहिलेले नसतानाही वाचता येते).

आणखी एक पुणेरी बाणा म्हणजे उगाच एका कुटुंबासाठी म्हणून खोल्या मिळणार नाहित. तुम्ही वट्ट पैसे मोजायला तयार असाल पण किमान २ कुटुंबे असल्याशिवाय आम्ही खोल्या देणार नाही. बर तुम्ही २ जोडपी आहात म्हणून तुम्हाला खोल्या मिळतील असेही नाही. किमान ६ लोक असल्याशिवाय आम्ही खोल्या देणार नाही. शिवाय समजा तुम्ही ३ जोडपी आहात म्हणजे तुम्हाला ३ वेगवेगळ्या खोल्या मिळतील असे नाही. तुम्हाला पुरतील अश्या खोल्या मिळतील. प्रत्येक कुटुंबाला वेगळी खोली वगैरे लाड नाहित. याउप्पर तुम्हाला यायचेच असेल तर पैसे भरा आणि या.

पुण्याहून आठपर्यंत निघाल्यास भैरवनाथची मिसळ किंवा श्रीराम चा वडापाव / कटवडा किंवा विरंगुळाचे थालिपीठ खाउन पावनखिंड रिसोर्ट वर पोचेपर्यंत साडेबारा होतील. पोचल्या पोचल्या वेलकम ड्रींक म्हणून वारणाची लस्सी मिळते . त्यानंतर रुम मध्ये स्थिरस्थावर होइस्तोवर जेवणाची वेळ होतेच. खोल्या बेसिक आहेत असे म्हणले तर ती पण अतिशयोक्ती असेल. ३/४/६ खाटा, २ आडवे मेज, एक आरसा, २ साइड टेबल्स आणि कपडे वाळवण्यासाठी एक रॅक इतकेच आहे खोलीत. टीव्ही नाही आणी लावण्याचा विचारही नाही (हे संकेतस्थळावरच दिले आहे). एसी नाही. पंखा आहे. हिवाळ्याच्या दिवसात तो देखील लागायचा नाही इतपत गारवा असतो. उन्हाळ्यात मात्र बर्‍यापैकी गरम होत असावी. घाटमाथा आहे. खोलीमध्ये साधे कपडे आणि बॅगा ठेवण्यासाठी कपाटही नाही (एक छोटी तिजोरी मात्र आहे). ट्युब नाही. छोट्ञा एलईडी बल्बसचे बनलेले लाइट आहेत मात्र ते एकाच बटणावर चालू बंद होतात. ते मंद किंवा प्रखर होण्यासाठी रेग्युलेटर आहे मात्र आमच्या खोल्यांमध्ये ते बिघडले होते. बाथरुम स्वच्छ / अस्वछतेच्या उंबरठ्यावर होते. कमोड अजुन स्वच्छ असणे गरजेचे होते. मेंटेनन्स चा अभावच आहे. स्विमिंग पूल आहे पण तिथे पालापाचोळा पडलेला होता. बाकी परिसर फार सुरेख आहे पण वारंवार साफसफाई करणे गरजेचे आहे. शिवाय परिसर देखील अजुन नेटका ठेवायला हवा. या झाल्या नकारात्मक गोप्ष्टी.

आता चांगल्या गोष्टींकडे वळूयात. जेवण फार सुरेख असते. नेहमीचे पनीर बटर मसाला आणि चिकन चिल्ली असले प्रकार नाहित. दोन्ही दिवस वेगवेगळे स्थानिक पदार्थ चाखता आले. अस्सल मराठमोळी पालेभाजी, वरण्याची उसळ, झुणका, कुर्मा, बीटाचे कळण असे वेगवेगळे पदार्थ होते. प्रत्येक जेव्णात एक गोड पदार्थ होताच. दूध/ तूप / लोण्याचा सढळ वापर होता. प्रत्येक जेवणात ताक होते आणि ते फार सुरेख होते. भाताशेजारी तूपाचे भांडे हातचे न राखता ठेवले होते. हवे तेवढे घ्या. प्रत्येक जेवणात आणि न्याहारीला पांढरे लोणी अगदी वाडगे भरभरुन होते. पराठ्याबरोबर तर प्रत्येक टेबलावर लोण्याचे वेगळे वाडगे देत होते. जेवणाची चव सुरेख होती. प्रत्येक जेवणात भजी किंवा तत्सम पदार्थ होता. कोल्हापुरी खर्डा / लसणीचा ठेचा देखील अप्रतिम होताच. दिवसातल्या एका जेवणात मांसाहार असतो. दोन्हीवेळेस हवा असल्यास वेगळे सांगावे लागते. त्याचा दरही वेगळा आहे. एक दिवस जेव्हा पावनखिंडीत घेउन जातात तेव्हा बार्बेक्यु असतो. दुपारपेक्षा रात्री रिसॉर्ट वर बार्बेक्यु चांगला लागेल पण हे देखील चांगले होते. २ / ३ दा चहा / कॉफी आणि बिस्कीट आणि नाष्ट्यामध्ये १-२ पदार्थ आणि चहा कॉफी अशी एकुणात खाण्यापिण्याची चंगळ आहे.

रिसॉर्टचा परिसर सुंदर आहे. देखभालीची गरज आहे. पण तरीही चांगले आहे. प्रत्येक खोलीला व्हरांडा आहे शिवाय दर ३-४ खोल्यांमागे ऐसपैस सिट आउट आहे जिथे छोटासा झोपाळा देखील आहे. पत्ते / कॅरम / टेबल टेनिस / बॅडमिंटन / सापशिडी इत्यादीची सोय आहे. पोहण्याचा तलाव आहे पण त्यात पालापाचोळा होता शिवाय आजूबाजूला जळवा होत्या. कराओकेची सोय आहे. मोठ्या ग्रुपला एकत्र बसण्यासाठी बर्‍याच जागा आहेत. एकुणात मोठ्या ग्रुपसाठी भन्नाट जागा आहे.

कर्माचारी वर्ग अतिशय नम्र आणि तत्पर आहे. अगदी रात्री अकराला देखील गादी, बेडशीट काचकूच न करता लगेच बदलून दिले. मागितलेल्या गोष्टी तत्परतेने मिळत होत्या.

 

 

 

 पावनखिंडीची खासियत म्हणजे ओपन जीप सफारी. जीप / टेम्पो / ट्रॅक्स वगैरेच्या वरच्या बाजूला कॅनोपी टाकुन बसण्याची सोय केली जाते आणि त्यातुन जंगल सफारी आणि पावनखिंडीत नेले जाते. न चुकवण्यासारखी गोष्ट. पावनखिंडीत घेउन जाणारे चालक गाइडचे सुद्धा काम करतात शिवाय आग्रह करकरुन आणि धीर देउन, मदत करुन सगळ्यांना खिंडीत उतरवतात.

रिसोर्ट मध्ये एक छोटीशी लायब्ररी आहे. ज्यात बरीच उत्तमोत्तम पुस्तके आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात पुस्तके वाचणे म्हणजे सुख असावे (मी वाचली नाहित. इतर गोष्टींमध्ये वेळ नाही मिळाला). शिवाय एक छोटेसे कन्विनियन्स स्टोअर आहे. दाडीचे सामान. कंगवा, ब्रश, पेस्ट, शॉर्टस, पावडर इत्यादी सामान मिळुन जाते. एकुणात बारीकसारीक गोष्टींचा विचार केलेला आहे.

 








 एकुणात खानपान, परिसर, कर्मचारी वर्ग, एकुण अनुभव इत्यादींसाठी पैकीच्या पैकी मार्क्स पण स्वच्छता, देखभाल यात मात्र सुधारणेची गरज. या सगळ्यासाठी (खाण्यापिण्यासकट) प्रत्येक खोलीमागे (४ व्यक्ती) प्रत्येक रात्रीसाठी आम्ही ९००० रुपये मोजले. जे की खोल्यांमधल्या सोयी सुविधा बघता नक्कीच जास्त आहेत. शिवाय जीप सफारीचे १८०० वेगळे. तरी एकुणात आलेल्या अनुभवाचा विचार करता मी इतरांना हे रिसॉर्ट नक्की सुचवेन.

आता तिथे काय करता येते / येइल याबद्दल थोडेसे. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी जेवण झाल्यावर चहा वगैरे घेउन आम्ही साधारण साडेचारच्या सुमारास ओपन जीप मधून जवळच्या मनोळी धरणावर गेलो. तिथे स्वखर्चाने नौकाविहार करता येइल. धरणाचे पाणी उथळ असल्याने तसे सेफ आहे. पाण्यात उतरता येते. नंतर आमचे चालक कम गाईड आम्हाला धरणाशेजारुन एका छोट्या जंगल वॉक वर घेउन गेले. मजा आली.


दुसर्‍या दिवशी सकाळी न्याहारीनंतर परत ओपन जीप मधुन सफारी असते. रस्त्यात कोकण दर्शन पोइंट करत पावनखिंडीत घेउन जातात. पावनखिंडीकडे जाणारा रस्ता निसर्गरम्य आहे आणि रस्त्यात विस्तृत जलाशय नजरेस पडतील.

पावनखिंडीत जाण्यासाठी आधी २१५ पायर्‍या उतराव्या लागतात आणी मग शिडीवरुन अंदाजे ५० -६० फूट खाली खिंडीत उतरावे लागते. प्रथमदर्शनी पाहता ट्रेकिंगची सवय नसलेल्यांना ही शिडी अवघड वाटु शकते पण तितकेसे अवअड काम नाही. चालक कम गाइड स्टाफ या कामात फार हिरीरीने मदत करतात. खिंडीत खाली उतरल्यावर ४०० - ५०० मीटर फिरता येइल. शिवाय पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एक छोटासा धबधबा आहे तिथे मजा करता येते.


 येताना रस्त्यात बार्बेक्युचा आस्वाद घेउन मग आम्ही विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाउन आलो. गडावर मात्र गेलो नाही. जिथे बार्बेक्युअ खायला घालतात ती जागा देखील निसर्गरम्य आहे. येताना रस्त्यात ४-५ गवे दिसले. एकुणात सहल सफळ संपुर्ण झाली.

यालाच २ - ३ दिवस वाढवुन पन्हाळा / पावस / मार्लेशवर / गणापतीपुळे असे सगळे जोडुन ५-६ दिवसाची ट्रिप करता येइल. या सगळ्या जागा जाउन येउन करण्याच्या अंतरावर आहेत. शिवाय परतीच्या प्रवासात थोडी वाट वाकडी करुन चाफळच्या नितांत सुंदर आणि प्रसन्न अश्या राम मंदिरात देखील जाता येइल. एकुणात ३ ते ५ दिवसांसाठी करण्यासाठी ही एक उत्तम सहल आहे.

 

 

 

 

 

 





 

 

 

पावनखिंड रेसॉर्ट...आमचं खुप आवडतं ठीकाण...
तीन वेळा तरी जाउन आलो इथे... मालक एकदम मस्त गप्पीष्ट आहेत ...
पुणेरी पाट्या भरपुर... पण सगळ्या सोई चोख....
रुम साध्या असल्या तरी आरामदायक आहेत.... आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो तरी रात्री छान थंडावा होता तिथे... त्यांनी वेब साईट वर आवर्जुन लिहिल्याप्रमाणे हे ठीकाण कुटूंबासाठी आहे त्यामुळे कपल रुम वगैरे प्रकार नाही...पण तरी आम्ही विनंती केली तेव्हा आम्हाला ३ बेड वाल्या रुम पर फॅमिली मिळाल्या होत्या....
धरण भेट, पावनखिंड सहल, वनभोजन ..सगळंच खुप मस्त... नातवंडांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी एकत्र मजा करायला खुप मस्त ठीकाण...
उत्कृष्ट जेवण ही त्यांची खासियत... उन्हाळ्यात गेल्यामुळे... अगदी हापुस चा आमरस- पुर्‍या, फणस भाजी असे स्थानिक पदार्थ खुप खायला मिळाले... शेवग्याचे सार, आमसुलाचे सार, खवा पोळी ( खवा पोळी सोबत दाटसर केसर घातलेलं मसाला दुध होतं...पोळी कशी थोडावेळ दुधात भिजत ठेवुन मगच खायची ते मालक येउन स्वतः प्रत्येकाला आवर्जुन सांगत होते... ) कोल्हापुरी चिकन , अंडाकरी ई पण सुंदर होते... वनभोजन हा एकदम मस्त प्रकार होता... त्याला बार्बेक्यु म्हणण्यापेक्षा वनभोजन हाच शब्द मस्त आहे.....चुलीत भाजलेले खरपुस बटाटे उलगडुन त्यात तूप आणि मीठ घालुन खायला पण मालकांनीच शिकवले...एकंदर प्रत्येकाला त्या त्या पदार्थाची ऑथेंटीक चव मिळावी अशी मालकांची धडपड दिसली...
बॅचलर लोकांना आम्हि बुकींग देत नाही असे मालकांनी स्वतः सांगितले...
एकंदरीत मस्त अनुभव
हा लेख वाचुन परत एकदा जावेसे वाटु लागले आहे...

Monday, November 15, 2021

भातवडी, अहमदनगर

 

पारगाव भातोडी
गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.
रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.
दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.
सुंदर प्रवेशद्वार
a
स्वयंभू नृसिंह
z
तांडव गणपती
१
गरुड देव
3
मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)
प्रदक्षिणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.
या घाटाची देखभाल केली तर एका पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.
मनोहरी जळ...
3
घाटाचा हाही उपयोग ..
१

उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा एक उत्तम पायंडा दिला आहे.
शरीफराजे समाधीस्थळ
१
१६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.
इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”
मस्त लाल चिंच
१
पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.
वीरभद्र
3
-भक्ती

Thursday, November 4, 2021

आळंदीतील अपरिचित धार्मिक स्थळे आणि पर्यटन केंद्र

 


By पितांबर लोहार

Unfamiliar religious and tourist Places in Alandi :आळंदी म्हटलं की आठवते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधी मंदिर. अनेक वारकरी भाविक भक्तांच श्रद्धास्थान. वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेलं तीर्थक्षेत्र. त्यामुळे आळंदीत नेहमीच वर्दळ असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह लगतच्या गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात, राजस्थान, तमीळनाडू, केरळ आदी राज्यातील भाविक आळंदीत येत असतात. पर्यटक व शालेय सहलीही दरवर्षी येतात. मात्र, संजीवन समाधी मंदिर, माऊलींनी भिंत चालवल्याचे ठिकाण. संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग आणि महान तपस्वी संत चांगदेव महाराज ज्या झाडाखली थांबले होते, ते विश्रांतवड स्थळ. या व्यतिरिक्त आळंदीत येणाऱ्यांना फारसी माहिती नाहीच. ते सरळ देहूकडे किंवा भीमाशंकरकडे किंवा परतीच्या मार्गावर निघतात. वास्तविकतः आळंदीच्या दहा किलामीटर परिसरात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळे आहेत. जी अनेकांना परिचित नाहीत. त्यांना भेट दिल्यास ज्ञानात भर तर पडणार आहेच, पण विरंगुळाही मिळणार आहे.

गजानन महाराज मंदिर
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने आळंदीत महाराजांचे मंदिर बांधले आहे. हे मंदिर दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाले आहे. हे मंदिरसुद्धा टोकडीवर असून वर ध्यान मंदिर आहे. टेकडीच्या टप्प्याटप्प्यवर शोभेची झुडपे व झाडे असून उद्यान साकारले आहे. संगमरवर लावून सुशोभिकरण केले आहे. संस्थानने निवास व भोजनाची व्यवस्थाही केली आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून मंदिराचा परिसर विकसित केला आहे.

जलाशय व सिद्धबेट
आळंदी येथे इंद्रायणी नदीवर बांध बांधला आहे. छोटेसे धरण म्हणूया हवे तर. सिद्घबेटाला लागून हे जलाशय आहे. आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सिद्धबेटाचे सुशोभिकरण करून चांगले उद्यान साकारले आहे. नदीच्या कडेने साधारणतः एक किलोमीटर लांबपर्यंत उद्यानाचा परिसर आहे. त्याला लागूनत जलाशय असल्याने त्याला घाट बांधला आहे. त्यात पोहोण्याचा आनंद अनेक लुटत असतात. बांधावरून नदीपात्रात पडणारे पाणी म्हणजे एक प्रकारचा धबधबाच आहे. एक दिवसाच्या विसरंगुळ्यासाठी हा परिसर छान आहे. अनेक जण एकत्र येऊन या परिसरात वनभोजनाचा आनंदही लुटत असतात.

घाट, मंदिर अन् सुवर्ण पिंपळ
इंद्रायणी नदीला दोन्ही तिरावर प्रशस्त घाट बांधला आहे. घाटाच्या पायऱ्या उतरून भाविक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिराकडे दर्शनासाठी जातात. मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. समोरच सभामंडप आहे. तिथे कीर्तन, भजन, जागर सुरू असतो. दर्शन बारीतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येते. गाभाऱ्यात विठ्ठल-रुख्मिणीची मूर्तीही आहे. शेजारी पूर्वाभिमूख गणपतीचे मंदिर आहे. मागे मुक्ताई मंडप असून संत मुक्ताईची मंदिर आहे. सिद्धेश्वराच्या मंदिरालगतच नांदुरकीचा वृक्ष आहे. तिथे अनेक साधक ज्ञानेश्वरी पारायण करत असतात. मंदिराच्या आवारातच सुवर्ण पिंपळ आहे. याच सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या मातोश्रींनीसुद्धा प्रदक्षिणा घातल्या होत्या, असे म्हणतात.

पद्मावती मंदिर
आळंदीतील प्रदक्षिणा मार्गावर वडगाव चौक आहे. तेथून उत्तरेकडी एक कच्चा रस्ता जातो. त्याला पद्मावती रस्ता असे म्हणतात. याच रस्त्यावर साधारण एक किलोमीटरवर पद्मावती मंदिर आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. आत प्रशस्त वातावरण आहे. एका बाजूला फुलांची झाडे आहेत. दुसऱ्या बाजूला छोटे उद्यान व लहानमुलांसाठी खेळणी आहेत. आजबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे. बहुतांश शेती आहे. मंदिराच्या परिसरात कवठाची झाडे आहेत. मंदिराचा गाभारा छोटासाच आहे. समोर सभामंडप आहे. छोट्याशा गाभाऱ्यात पद्मावती मातेची प्रसन्न मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये येथे येणाऱ्या भाविकांना दुधाचा प्रसाद काही स्थानिक शेतकरी भक्तांकडून दिला जातो. पद्मावती मातेचे मंदिर व परिसर खूप सुंदर व निसर्गसंपन्न आहे. पण, मंदिरावर कळस नाही. सर्व मंदिर दगडात बांधलेले आहे. त्याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते की, खूप वर्षांपूर्वी रानवडे नावाच्या भक्ताला देवीने दृष्टांत दिला की, मी अमूक अमूक ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माझं मंदिर बांध. पण, एका रात्रीत सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून झाले पाहिजे. अन्यथा संकट कोसळले. त्यानुसार, त्या शेतकऱ्याने सूर्यास्तानंतर मंदिर बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ते बांधून पूर्ण करायचे होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून तयार झाले. पण, कळसाचे काम राहिले होते. तेव्हापासून मंदिर तसेच आहे कळसाशिवाय. अर्थात पद्मावती मातेच्या मंदिराला कळस नाही. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोर सभामंडप बांधला आहे.

अडबंगनाथ मंदिर
आळंदीला लागूनच पिंपरी-चिंचवड शहरातील एक उपनगर म्हणजे डुडुळगाव. पौराणिक काळातील नाथ संप्रदायातील अडगंबनाथांचे मंदिर येथे आहे. बाजूलाच इंद्रायणी नदीचे प्रशस्त मंदिर आहे. भटकंतीसाठी इंद्रायणी नदीचा परिसर उत्तम आहे.

ऐतिहासिक चऱ्होली
आळंदी पासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली गाव आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये गावाचा समावेश झाला. इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या आधीपासून गाव अस्तित्वात होते, याच्या खुणा आजही सापडतात. येथीपल ग्रामदैवत वाघेश्‍वर मंदिर. गावाजवळीलच एका टेकडीवर वसलेले. तेथील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचे समजते. सध्या स्वकाम सेवा मंडळ संस्थेने लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. पूर्वी गावाला संपूर्ण तटबंदी होती, आता फक्त एक दगडी कमान शिल्लक आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांचा सहवास कधीकाळी या गावाला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ, शुर, पराक्रमी सरदार (दुळबाजी तापकीर सरकार) व तापकीर सरदार घराणे, दाभाडे सरकार आणि देशमुख सरकार हे या गावचे रहिवासी आहेत.जुने वाडे व घरांचे दर्शन चऱ्होलीसह लगतच्या चोविसावाडी, वडमुखवाडी, निरगुडी, धोनोरे आदी गावांमध्ये आजही जुनी कौलारू घरे शिल्लक आहेत. गावठाणात जुने वाडे आहेत. त्यांचे नक्षी काम, कलाकुसर बघण्या व अभ्‍यासण्यासारखे आहे. आळंदीतून चिंबळी रस्त्याने गेल्यास उजव्या बाजूला एक टेकडी आहे. त्यावर आसाराम बापू यांचा आश्रम आहे. सर्व परिसर बघण्यासारखा आहे.

शिवसृष्टी पर्यटन स्थळ
वाघेश्‍वर मंदिर एका टेकडीवर आहे. तेथून गावाचा संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आहे. इंद्रायणी नदीचे विहंगमदृष्य व निसर्गरम्य परिसर डोळ्यांना सुखावतो. मंदिराच्या परिसरात शिवसृष्टी साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा १६ फुट उंच अश्‍वारूढ पुतळा उभारला आहे. येथील उद्यान प्रशस्त आहे. वाघेश्‍वर मंदिर परिसर एक पर्यटन स्थळ झाले आहे. चऱ्होलीच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी चंद्राकार वाहते.

तुळापूरचे नौकाविहार
आळंदीपासून तुळापूर साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचे पूर्वीचे नाव ‘नांगरवास’ होते, असे म्हणतात. या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगण आहे. अर्थात त्रिवेणी संगम असल्याने अनेक भाविक स्नानासाठी येतात. तीन नद्यांच्या संगमामुळे बाराही महिने पाणी अथांग असते. त्यामुळे येथे नेहमी बोटिंग सुरू असते. या माध्यमातून नौकाविहाराचा आनंदही लुटता येतो.

संभाजी महारात समाधीस्थळ

तुळापूर येथे त्रिवेणी संगमावर प्राचीन शिवालय आहे. त्याला संगमेश्वर असे म्हणतात. मंदिराला तटबंदी आहे. मंदिरापासूनच नदी घाटावर जाता येते. येथे मंदिराच्या समोरच छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. त्यात महाराजांचे जीवन चरित्र रेखाटले आहे. एका बाजूला अश्वारूढ पुतळा आहे.

लोहगावचा खंडोबा माळ ट्रेक
चऱ्होली गावाची हद्द संपते त्या ठिकाणी पुणे शहर सुरू होते. अजिंक्य डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची इमारत पिंपरी-चिंचवड शहरात असून प्रवेशद्वार व मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. या ठिकाणीच उंच टेकडी आहे. टेकडी लंब गोलाकार असून तिला दोन शिखरे आहे. दोन शिखरांच्या मध्ये पठार आहे. पठाराचा भाग खडकाळ असून त्यात पाणी साचलेले आहे. एका शिखरावर खंडोबाचे मंदिर आहे. त्यालाच खंडोबचा माळ म्हणतात. त्यावर डी. वाय. पाटील संकुलाच्या प्रवेशद्वारापासून ट्रेकिंग करत जाता येते. साधारणतः अर्धा तास चालत टेकडी चढून गेल्यावर दुसऱ्या टोकाला खंडोबाचे मंदिर आहे. तेथून लोहगावच्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.

विमानतळ दर्शन टेकऑफ व लॅंडिंग
खंडोबा माळावरून आकाश निरीक्षण करता येते. वेगवेगळ्या प्रकारची झाडे येथे असल्याने वनस्पती निरीक्षणीही करता येते. माळावरून उत्तर वायव्यवेला बघितल्यास चऱ्होलीगाव व आळंदीचे विहंगम दृश्य दिसते. दक्षणेला पूणे शहराचे दर्शन घडते. लोहगाव विमानतळही येथून दिसते. त्यामुळे विमानांचे लॅंडिंग व टेकऑफ कसे होते याचे निरीक्षण करता.येथे. टेकडी भटकंती करताना निसर्ब दर्शनाचा आनंदही घेता येतो.

ऐतिहासिक ‘तुला’पूर
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा नद्यांच्या काठावर नांगरवासगावी अर्थात तुळापूर येथे पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली. पण, ‘एवढा थोर बच्चा कसा जोखावा’ याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोने-नाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या ‘नांगरवास’ गावाला ‘तुळापूर’ असे म्हटले जावू लागले असे सांगितले जाते.

चाकणचा भुईकोट
आळंदीपासून दहा किलोमीटर अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गाव आहे. तिथे भुईकोट किल्ला आहे. तो आजही इतिहासाची साक्ष देतो. सध्या किल्ला भग्नावस्थेत असून त्याची तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यालाच संग्रामदुर्ग असेही म्हणतात. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हा किल्ला शिवरायांना भेट दिला होता. त्यामुळे महाराजांनीसुद्धा फिरंगोजी यांनाच किल्लेदार म्हणून घोषित केले होते. हा किल्ला जिंकण्यासाठी शाहीस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला तब्बल ५६ दिवस लागले होते.

चक्रेश्वर मंदिर
चाकण येथील चक्रेश्वर मंदिर हा देखील एक ऐतिहासिक व पौराणिक ठेवा आहे. रामायण काळात राजा दशरथाचे अन्य राजांशी युद्ध सुरू होते. त्या वेळी त्यांच्या रथाचा आस मोडून चाक निखळले होते. ते ज्या ठिकाणी पडले त्याला चक्रेश्वर म्हणून ओळखले जाते. तसेच, महाभारत काळात श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्क जिथे पडते होते. ते ठिकाण म्हणजे चक्रेश्वर होय, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. त्या चक्रावरूनच चाकण असे नाव या गावाला मिळाल्याचेही सांगितले जाते.

वडमुखवाडीतील संतशिल्‍प
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आळंदी-पुणे पालखी मार्गावर सकल संत भेटीवर आधारित समह शिल्प उभारले जात आहे. यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्यासह सकल संतांचे बावीस शिल्प आहेत. परिसरात ओपन थिएटर आणि उद्यान उभारणीचे काम सुरू आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. याच ठिकाणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोरल्या पादुका मंदिर आहे. शेजारीच प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर आहे. 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...