Thursday, January 13, 2022

डोन्ट वरी, बी हंपी..!!

नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकुटुंब हंपी दर्शन झाले. ६ दिवसांची सहल होती. त्यातील ३ दिवस हम्पीसाठी होते (हंपी साठी तीनच दिवस दिले याचा खूप पश्चाताप होत आहे). उर्वरित ३ दिवस बदामी, पट्टदक्कल, ऐहोळे, कुडल संगम असा प्रवास केला.
रामायणातील काही प्रसंग इथे घडले आहेत. प्रभू रामचंद्रांचा सहवास या क्षेत्रास लाभला असला तरी, हंपी ओळखली जाते ती सम्राट कृष्णदेवरायामुळे. मौर्य, चालुक्य, होयसळ, काकतीय, संगम इ. अनेक राजघराण्यांनी इथे राज्य केले, पण देवरायाच्या कालखंडात या शहराने जे वैभव अनुभवलं असेल ते खचितच इतर कोणताही राजा करू शकला नसता.

विजय नगर जिल्ह्यामध्ये असलेले हम्पी हे होस्पेट पासून १५ किमी लांब आहे. हम्पी मध्ये राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स आहेत, परंतु के. एस. टी. डी. सी. चे हॉटेल्स उत्तम पर्याय आहेत. खुद्द हंपी मध्ये देखील के. एस. टी. डी. सी चे हॉटेल आहे परंतु आम्हाला तेथील बुकींग मिळाले नसल्यामुळे होस्पेटमधील ‘मयुरा विजयानगरा’ या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. हॉटेलच्या रूम्स प्रशस्त, हवेशीर आणि आरामदायी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक रूमच्या दर्शनीय भिंतीवर हम्पी मधील ऐतिहासिक स्मारकांचे वॉलपेपर त्या रूमची शोभा वाढवतात.

हॉटेलमधील खोली
हॉटेलमधील खोली

या हॉटेलपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर तुंगभद्रा धरण आहे. हॉटेलचे चेक-इन दुपारी एक वाजता होते. आम्ही साधारण १२:३० वाजता हॉटेल मध्ये पोचलो होतो. सुदैवाने रूम्स रिकाम्या असल्यामुळे आम्हाला वापरता आल्या, व फ्रेश होऊन हंपीकडे जाण्यास निघालो. जाताना सुरुवातीला कमलापूर लागते. कमलापूर मधील हॉटेलमध्ये कर्नाटकी राईस प्लेट खाल्ली. चव ठीकठाक होती. भूक लागल्यामुळे चवीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. जेवण आटोपून हंपी दर्शनाला निघालो, त्यावेळेस साधारण तीन वाजले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जेवढे बघणे शक्य आहे, तेवढे बघायचे असे ठरवले.
गळ्यामध्ये सरकारी ओळख पत्र असलेले भरपूर गाईड हम्पी मध्ये आहेत. त्यातीलच एक गाईड आम्ही निवडला. सुदैवानं आमचा गाईड मराठी भाषा चांगल्या पद्धतीने बोलू आणि समजू शकत होता.
हंपीला जाताना आपले स्वागत होते ते प्रचंड शिलांपासून पासून बनलेल्या टेकड्यांनी! या शिळा लगोरी प्रमाणे एकावर एक अशा रचलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला या प्रकारच्या आवाढव्य लगोऱ्या पाहून एकदा तरी मनात असा विचार येतो की, यातील एक जरी शिळा हलली तर काय होईल!! पण हा विचार फार काळ टिकत नाही. कारण भव्य प्रस्तरांनी बनलेली हेमकूट टेकडी आपले लक्ष वेधून घेते. एका पौराणिक कथेनुसार कुबेराने या क्षेत्रावर सुवर्ण नाण्यांचा वर्षाव केला होता, म्हणून या टेकडीला हेमकूट असे म्हणतात.

हेमकूट टेकडी
हेमकूट टेकडी

या हेमकूट टेकडीवर कडलेकालू गणेशाचे मंदिर आहे. भरपूर शिल्पांकित खांब असलेला सभामंडप व गणेश मूर्ती असलेले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपातील खांबांवर विविध वाद्य वाजवणाऱ्या परदेशी कलाकारांची शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अखंड पाषाणात कोरलेली, एका दृष्टीक्षेपात न मावणारी भव्य अशी गणेश मूर्ती आहे. या मूर्तीची उंची जवळपास ४.५ मीटर इतकी आहे. हंपी वर एकेकाळी संगम घराण्याची देखील सत्ता होती. हे संगम घराणे विरुपाक्ष शिवाचे निस्सीम भक्त होते. विरूपाक्ष मंदिराकडे जाण्याचा प्राचीन मार्ग हेमकूट टेकडीवरील कडलेकालू गणेश मंदिरावरूनच जातो. संगम राजे कोणत्याही मोहीमेपूर्वी विरुपाक्षाचा आशीर्वाद घेत असत. राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह याच मार्गाने येत असे. प्रथम श्री कडलेकालू गणेशास अभिषेक करून, हेमकूट उतरून विरुपाक्ष शिवाचे दर्शन घेत असे.
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब

खांबांवरील काही शिल्पे
खांबांवरील काही शिल्पे

वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार
वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार

.

एक वेगळीच मुद्रा
एक वेगळीच मुद्रा

मल्लयुद्ध करणारे युवक
मल्लयुद्ध करणारे युवक

बहामनी सुलतानाच्या आक्रमणाच्या खुणा हम्पी मध्ये सर्वच ठिकाणी दिसतात. या महाकाय अशा गणेश मूर्ती मध्ये सोने, हिरे अशी संपत्ती लपवली असेल असे वाटून, गणेशाच्या उदराला छेद देण्यात आला आणि त्याचा एक तुकडा वेगळा करण्यात आला. पण हा तर एक भरीव पाषाण आहे असे लक्षात आल्यानंतर चिडलेल्या सुलतानाने तेथील शिल्पांकित थांब उध्वस्त केले. पुरातत्व खात्याने दुसरा पाषाण लावून गणेशाचे छेडलेले उदर जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु खूप प्रयत्न करूनही मूळ मूर्तीचे texture त्या पाषाणाला देता आले नसल्यामुळे तो पाषाण तिथे अजूनही पडून आहे.

श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती
श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती

उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे
उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे.

हेमकूट टेकडीवर काही ठिकाणी उखळासारखे खळगे आहेत. बहुदा त्या खांब रोवण्यासाठी केलेल्या खाचा असाव्यात. काही कारणाने ते काम अपूर्ण राहिलेले असावे. या टेकडीवरून विरुपाक्ष मंदिराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

टेकडीवरील खळगे
टेकडीवरील खळगे

हेमकुट टेकडीच्या डाव्या बाजूला ऋष्यमुक पर्वत तर उजव्या बाजूला मातंग पर्वत आहे.

हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत
हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत

हेमकुट टेकडीवरून विरुपाक्ष मंदिरात जाण्याचा प्राचीन मार्ग बंद असल्याने टेकडीला वळसा घालून मंदिराकडे जावे लागते. जातानाच्या मार्गावर अनेक लहान-सहान मंदिराचे भग्नावशेष इतस्त: विखुरलेले दिसतात. विरुपाक्ष मंदिरास जाण्यासाठी जवळपास ४०० मीटर रस्ता पायी पार करावा लागतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला हेमकूट टेकडी व उजव्या बाजूला प्राचीन बाजारपेठेचे अवशेष दिसतात. बाजारामधील दुकानांची रचना दुमजली आहे. सध्या फक्त या दुकानांचे खांबच शिल्लक आहेत. या बाजारात पूर्वी सोने, चांदी, हिरे यांचा व्यापार होत असे. विजयनगरच्या वैभवात या व्यापारीसंकुलाचा खूप मोठा हातभार होता. शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून बाजारपेठेची भव्यता जाणवते. आणि नकळतपणे सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या लखलखाटात उजळलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर आणून मन रोमांचित होते. अशा रोमांचित मनाने मंदिरात जाण्यासाठी आम्ही देवरायाने बांधलेल्या भल्यामोठ्या गोपुराकडे प्रस्थान केले.

विरुपाक्ष मंदिरासमोरील बाजार
.

विरुपाक्ष मंदिराची स्थापना ७व्या शतकात होयसळांनी केली . चालुक्य राजांनी मंदिरामध्ये भर घातली. १५व्या शतकामध्ये हंपी विजयनगराची राजधानी झाली आणि सम्राट कृष्णदेवरायाने मंदिरास गोपुरे व तटबंदी बांधून वैभवास आणले. मंदिरामध्ये एकूण ३ गोपुरे आहेत. त्यापैकी पूर्वाभिमुख असलेले गोपूर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ९ मजली शिल्पांनी खचाखच भरलेल्या या गोपुराची उंची ५० मीटर इतकी आहे.

मुख्य गोपूर
.

गोपुराच्या डाव्या बाजूला ‘कालारि शिवाचे’ शिल्प आहे. मार्कंडेय मुनींचे प्राण हरण करण्यासाठी कालपुरुष आला असता, त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी शंकराने कालपुरुषाशी युद्ध केले व त्यास हरवले अशी कथा या २ फूट लांबीच्या शिल्पामध्ये मांडली आहे. देवरायाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गोपूर शैलीस त्याच्या नावावरून ‘रायगोपुरे’ असे म्हणतात. दक्षिण भारतामध्ये हमखास अशी गोपुरे आढळतात.

कालारि शिव शिल्प
.

गोपुरातून आत गेल्यावर डाव्या बाजूस त्रिकाळदर्शनाचे प्रतिक असलेला त्रिमुख नंदी आहे. व उजव्या बाजूला एका भिंतीवर विजयनगराचे ध्वजचिन्ह आहे. या ध्वजावर चंद्र, सुर्य, वराह व उलटा खंजीर आहे. चंद्र सुर्य हे काळाचे प्रतिक आहे, वराह विष्णूचे व खंजीर विजयाचे प्रतिक आहे. ‘ विष्णूच्या कृपेने आचंद्र्सुर्य आम्ही विजय मिळवत राहू’ असा या ध्वजाचा अर्थ.

ध्वजचिन्ह
.

.

ध्वजा शेजारीच कृष्णदेव रायाचा जुन्या कन्नड लिपीतील शिलालेख आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूनी भरपूर ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामध्ये सतत धार्मिक कार्य चालू असते.अग्नेयेकडे मुद्पाकखाना आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ व बलीस्तंभ आहे. नंदिमंडप , सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहामध्ये प्रसन्न विरुपाक्ष विराजमान आहेत. या शिवलिंगाची दैनंदिन पूजा होत असते. दीपावली दरम्यान तिकडे नुकताच दीपोत्सवही साजरा झाला होता.
.

दीपस्तंभ व बलीस्तंभ
.

रंगमंडपामध्ये रंगीत भित्तीचित्रे आहे. यामध्ये शिव पार्वती विवाह, राजाचे युद्ध, अर्जुनाचा मत्स्यभेद अशी चित्रे चितारली आहेत. या चित्रांनी अशी काही मोहिनी घातली होती कि त्यांचे फोटो घेण्याचे भान सुद्धा राहिले नाही.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिव पूजनाचा महिमा कोरला आहे. यामध्ये सर्व योनीतील सजीव शंकराची उपासना करत आहेत असे दाखवले आहे. या शिल्पामध्ये कन्नाप्पा नयनार चे देखील शिल्प आहे. कन्नप्पा नयनार हा निस्सीम शिवभक्त होता. तो रोज सरोवरातून ताजी कमलफुले शंकरास अर्पण करत असे. एकदा त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने त्याला कमल फुलांच्या ऐवजी नेत्रकमळ वाहण्यास सांगितले. कन्नप्पाने किंचितही विचार न करता कट्यारीने एक डोळा काढला व शिवलिंगास लावला. दुसरा डोळा काढल्यानंतर अंध झाल्याने तो योग्य ठिकाणी लावता येणार नाही असे पाहून त्याने खुणेसाठी आपला एक पाय शिवलिंगावर ठेवला. आणि दुसरा डोळा काढणार इतक्यात शंकर प्रकट झाले व त्यांनी प्रसन्न होऊन कान्नप्पास डोळे देऊन आशीर्वाद दिला.

.

या भित्तीशिल्पाच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला दक्षिणेकडे काही परिवार देवतांची मंदिरे आहेत व एक पुष्करणी तलाव आहे. याच बाजूला ७ ते ८ पायर्यांचा एक दगडी जीना आहे. हा जीना वर चढून गेल्यावर एक अंधारी खोली आहे. या खोलीच्या एका भिंतीवर फुटभर लांबीचा एक झरोका आहे आणि त्यासमोरील भिंत पांढऱ्या रंगाने रंगवली आहे. या भिंतीवर झरोक्यामधून मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुराची उलटी प्रतिमा दिसते. एका फुटभर झरोक्यामधून ५० मीटर उंच गोपुराची संपूर्ण उलटी प्रतिमा पडण्याचे तंत्रज्ञान अचंबित करणारे आहे. (वैज्ञानिक भाषेमध्ये या तंत्रज्ञानास पिन होल कॅमेरा तंत्र म्हणतात.)

.

अशा वास्तू बांधणारे स्थपती हे मनुष्य नसतीलच असे वाटते. दैवी देणगी असल्याशिवाय असल्या कलाकृती जन्म घेत नाहीत. एवढी अफाट बुद्धिमत्ता, कौशल्ये यांचा मध्येच कुठे ऱ्हास झाला या प्रश्नाने खूप पोखरून काढले. आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगावा कि वर्तमान काळातील निष्क्रीयतेबद्दल चिंता व्यक्त करावी या प्रश्नाचा विचार करत संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो.

क्रमशः


संध्याकाळी ७:०० च्या दरम्यान हंपीमधून बाहेर पडलो. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये परततानाच वाटेतील एका छोट्या हॉटेलमध्ये उत्तप्पा खाल्ला, कारण जेवण करण्याइतपत भूक कोणालाच नव्हती. दिवसभराचा प्रवास आणि भटकंतीमुळे सगळेच खूप दमले होते. त्यामुळे रात्री थोड्याफार गप्पा मारून ९:०० वाजता सर्वजण झोपी गेलो.
पहाटे ५:३० ला मला जाग आली. झोप व्यवस्थित झाल्यामुळे फ्रेश वाटत होते. हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला. तिथेच न्याहारी करून बाहेर पडायचे असे ठरले असल्याने न्याहारी किती वाजता सुरु होते याची चौकशी करून रूमवर आले. तो पर्यंत बाकीचे उठले होते. ८ वाजेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपून सर्वजण तयार झाले. हॉटेलच्या पूरक नाश्त्यामध्ये इडली, उडीद वडा, पोहे आणि अननस शिरा असे पदार्थ होते. सर्वच पदार्थ रुचकर होते. पण मला त्यातील उडीद वडा खूप आवडला. वडा जितका कुरकुरीत होता तितकाच स्पोन्जी सुद्धा होता. वडा साम्बारावर ताव मारून पुढील हंपी दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी पाहिलं ते कृष्णमंदिर.

ओरिसाचा राजा गजपती याचे साम्राज्य आंध्र व तेलंगणातील काही भागापर्यंत होते. साम्राज्य विस्तार करण्यासाठी इ.स. १५१२ मध्ये कृष्णदेवरायाने ओरिसावर चाल करून तो भाग आपल्या साम्राज्यास जोडला. या स्वारीमध्ये त्याने तेथील बाळकृष्णाची मूर्ती आणली व तिच्यासाठी हे मंदिर बांधले. [बालकृष्णाबरोबरच तहानुसार रायाने आपली तिसरी पत्नी म्हणचेच गजपती राजाची कन्या जगन्मोहिनीशी (हिला पद्मावती सुद्धा म्हणतात) विवाह करून तिला विजयनगरात आणले. या उत्कल लढाईनंतर रायाने सपत्नीक तिरूमल येथे जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेतले होते. या भेटीत त्याने व्यंकटेशास हिरे, माणके तसेच त्याच्या तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी या दोन्ही पत्नींनी चांदीची ताटे आणि पेले दिले होते. त्यानंतर रायाने तिरूमल मंदिरामध्ये दोन पत्नीन्सोबत पंचधातूंच्या मुर्त्या घडवून घेतल्या, ज्या आजहि व्यंकटेश मंदिरात पाहायला मिळतात. इथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे रायाने यावेळेस नवपरिणीत वधू जगन्मोहिनीची मूर्ती का बरे घडवली नसेल? उपलब्ध साहित्यात या दर्शन भेटीमध्ये तिचा कुठेच उल्लेख नाही.]

कृष्ण्मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एक उंच दगडी चौकट आहे. या चौकटीवर एका बाजूला विष्णूचे दशावतार आणि दुसऱ्या बाजूला पोपट, मोर, सारिका इ. पक्षांची शिल्पे कोरली आहेत. हि सर्व शिल्पे एका वेलबुट्टीने बांधली आहेत. चौकटीच्या वरच्या भागावर नागपाश आहेत. बहुदा वाईट शक्तींना बाहेर रोखण्यासाठी तशी योजना असावी.

प्रवेश्द्वारावरची चौकट

प्रवेशद्वार चौकट

चौकटीवरील नाग पाश

chaukat

प्रवेशद्वारावर गोपूर आहे. या गोपुरावर कृष्ण्देवरायाच्या कलिंग स्वारीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच मुख्य मंदिर आहे. मंदिरासमोर बलीशीला आहे. (बाळकृष्णाला बळी दिल्याचे यापूर्वी कधी ऐकले नव्हते.) अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ५० खांबांवर हे दोन्ही मंडप तोलले आहेत. खांबावर गरुड, हनुमान, विष्णूचे इतर अवतार तसेच कृष्णलीला कोरल्या आहेत. या मंडपांच्या तिन्ही बाजूना बाहेरून मोठमोठाली व्यालशिल्पे आहेत.

व्यालशिल्पे

१

c

ग

गर्भगृहामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती, पण ती सध्या एका संग्रहालयामध्ये आहे. मुख्यमंदिराच्या उजव्या बाजूस एक छोटे गणेश मंदिर आहे. गणेश मूर्ती नाहीये पण मूर्तीच्या चबुतऱ्यावरील उंदीरमामा स्पष्ट दिसतात.

गणेश मंदिर

व

गणेश मुर्तीखालील चबुतरा

.

बाळकृष्ण मंदिराच्या मागे उजव्या बाजूस रुक्मिणी मंदिर देखील आहे. अग्न्येय दिशेस पाकशाला आहे व मंदिराच्या चहुबाजूनी पूजापाठ यज्ञविधी करण्यासाठी ओवऱ्या आहेत. दक्षिण भारतामध्ये कोणत्याही मंदिर परिसरात पुष्करणी तलाव असतोच. भाविकांना पूजा अथवा देवास जलाभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी उपलव्ध व्हावे म्हणून हे तलाव बांधतात. नवीन भाविकांना पुष्करणी सहज शोधता यावी म्हणून मंदिराच्या मुख्य भिंतीवर अथवा प्रवेश भिंतीवर एक मत्स्यशिल्प कोरलेले असते. या माशाचे तोंड ज्या दिशेला असते, त्या दिशेस पुष्करणी असते. कृष्ण्मंदिरासमोर देखील पुष्करणी तलाव आहे.

पुष्करणीची दिशा दाखवणारे मत्स्यशिल्प

m

पुष्करणी

p

मंदिरासमोरून एक रस्ता जातो, या रस्त्याच्या पलीकडे एक दगडी आयताकृती दानपेटी आहे. दानपेटीच्या दर्शनी बाजूवर चक्र, गंध, शंख व चंद्र, सुर्य अशी व्यंकटेशाची चिन्हे आहेत. दानपेटीला दोन दगडी झाकणे आहेत आणि पैसे टाकण्यासाठी दोन चौकोनी भगदाडे आहेत. लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करता यावे म्हणून ती दानपेटी ठेवली होती असे आम्हाला गाईडने सांगितले.

दानपेटी

द

पैसे टाकण्याची जागा

द

पुढील ठिकाण चालत जाण्या इतपत अंतरावर होते, त्यामुळे गाडी कृष्ण मंदिराशेजारीच पार्क केली आणि आम्ही चालत निघालो. जाताना एका बाजूला केळीच्या बागा होत्या आणि दुसऱ्या बाजूला भग्नावशेष विखुरलेले होते. वाटेत एके ठिकाणी चौकोनी दगडी कमान लागली. तत्कालीन करवसुलीचे ते ठिकाण होते. कमानीमधून बाहेर पडून ५ ते ७ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला हम्पी मधील मुख्य आकर्षण असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मूर्तीने लक्ष वेधून घेतले. ६.७ मी उंची असलेली ही मूर्ती एकपाषाणी आहे.

न

आर्य कृष्णभट्ट नावाच्या मुर्तीकराने इ.स. १५२८ मध्ये ही मूर्ती घडवली आहे. सप्तफणी शेषाच्या ललितासनामध्ये नरसिंहस्वामी विराजमान आहेत. डाव्या मांडीवर लक्ष्मी होती पण सध्या नाहीशी आहे. सध्या हि मूर्ती विनाछत उघड्यावरच आहे. पण पूर्वी येथे एक ६ खांबी मंदिर होते आणि मंदिराला चंदनी छत देखील होते, परंतु आक्रमकांनी ते छत जाळून टाकले व खांब आणि लक्ष्मीची मूर्ती देखील उद्ध्वस्त केली . आगीच्या ज्वालांची झळ लागून नरसिंहाच्या छातीवर काळा डाग पडला व तडे देखील गेले आहेत. मंदिरातील सहा खांबांपैकी सध्या २ च खांब शिल्लक आहेत. हि मूर्ती उठून दिसते ती नरसिंहाच्या विलाक्ष्ण उग्र डोळ्यांमुळे! खोबणीतून बाहेर आलेले चेंडूच्या आकाराचे गोल गरगरीत मोठे डोळे, विक्राळ सुळे, रुंद जबडा यामुळे मूर्ती अधिकच उग्र भासते. नरसिंह मूर्तीचे पाय देखील तोडले गेले होते आणि ते इतस्ततः विखुरले होते, पुरातत्व विभागाने ते जोडले आणि त्यांना आधार म्हणून गुढघ्यावर एक पट्टा लावला आहे असे आम्हाला गाईडने सांगितले होते. परंतु अभ्यासकांच्या मते तो पट्टा अलिकडचा नसून योगपट्ट आहे.
लक्ष्मीनृसिंह मूर्ती शेजारीच बडवी लिंग मंदिर आहे. बडवी म्हणजे गरीब. एका गरीब स्त्रीने स्वखर्चाने हे मंदिर बांधले आहे. आतमध्ये एक पाषाणी भव्य असे शिवलिंग आहे. शिवलिंग कायम पाण्यात असते. पृवी तिथे तुंगभद्रेचे पाणी येत होते, त्यासाठी चिंचोळी दगडी वाट केली होती. परंतु सध्या पाईपलाईन द्वारे पाणी सोडले जाते. शिवलिंगाच्या साळुंकीवर त्रिनेत्र कोरले आहेत. एका सध्या रेषेने हे नेत्र दाखवले आहेत, यावरून तिथे आणखी काही कोरीव काम करायचे होते, परंतु ते काही कारणास्तव राहून गेले असावे..

बडवी लिंग

ब

येथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे ज्या आक्रमकांनी नृसिंह मंदिराचे एवढी नासधूस केली त्यांनी शेजारीच असणार्या बडवी लिंगास धक्का देखील कसा लावला नाही ! याचे कारण काय असावे? शिवलिंग मानवी स्वरुपात नसल्याने तो देव नसून फक्त एक शिल्प आहे असे वाटल्याने सुरक्षित राहिले असावे कि या प्रकारास कुठे तरी शैव वैष्णव संघर्षाची किनार आहे ते त्या नरसिंहास व भोलेनाथासच ठाऊक !!
क्रमशः













  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...