महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सु. ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सु. २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुकमे १७ ० ५ ´ उ. ते १८० ११´ उ. अक्षांश व ७३० ३३´ पू. ते ७४० ५४´ पू. रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल अंतर १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सातारा हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते पुणे-बंगलोर या अशियाई महामार्गावर (क्र. ४७) वसले आहे.
इतिहास :
अश्मयुगीन व ताम्र पाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा-कोयना नदीखोऱ्यात आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती मात्र जिल्ह्यात विस्तृत उत्खनन व शास्त्रीय दृष्ट्या अन्वेषण झालेले नाही. सातवाहनांची (इ. स. पू. सु. २००– इ. स.३००) सत्ता या प्रदेशावर होती. तत्कालीन वरवंटे, जाती, खापरे इ. अवशेष वाईच्या किवरा ओढ्याच्या परिसरात आढळले आहेत. तसेच या काळात काही हीनयान बौद्घलेणी कराड-वाई (लोहारे) येथे खोदली असून शिरवळ, कुंडल, भोसे, माळेवाडी आदी ठिकाणी त्याकाळी गुंफा खोदल्या होत्या. भारहूत (मध्यप्रदेश) स्तूपाच्या अभिलेखात करहाटक (कराड) येथील यात्रेकरूं नी अनुदान दिल्याचा उल्लेख आढळतो.
सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्तसम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपलाभाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८–६१), निजामुद्दीन (कार. १४६१–६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३–८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि ⇨सातारा संस्थानची निर्मिती झाली. ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८) नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता (१९४७).
स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रे स समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले, त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्घतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत दैदीप्यमान शिखर म्हणजे साताऱ्याचे प्रतिसरकार होय.
स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले.
नद्या :
सह्याद्रीच्या मूळरांगेपासून लहानलहान फाटे पूर्वेस किंवा आग्नेय दिशेस पसरलेले आहेत. त्यांना अनुसरून नद्यांची वेगवेगळी खोरी निर्माण झाली आहेत. सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णाही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, जिल्ह्याच्या साधारण मध्य भागातून सु. १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना ह्या उजवीकडील आणि वसना व येरळा ह्या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णानदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते. कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे. कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.
दळणवळण :- मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट; सातारा-रत्नागिरी रस्त्यावरील कुंभार्ली घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट असून, वाई-महाबळेश्र्वर रस्त्यावरील पसरणी घाट व महाबळेश्र्वर - महाड मार्गावरील पार घाट हे घाटदेखील निसर्गसुंदर व उपयुक्त आहेत. सातार्याचे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर ...पासून अंतर(कि.मी.) मुंबई २७२ नागपूर ७६९ औरंगाबाद ३३८ रत्नागिरी २४२ पुणे ११२
सातारा जिल्हा माहिती .. मूलत: सातारा हे शहराचे नाव नसून ज्या किल्ल्याजवळ त्याची वसाहत आहे त्या किल्ल्याचे हे नाव आहे. सातारा किल्ल्याची जी नावे उपलब्ध आहेत ती अशी : मंगलाई, सप्तर्षी, सतारे, उकाबैन, इसमतआरा, शाहगड आणि अजीमतारा. या सहा नावांपैकी पहिली तीन फार जुनी आहेत. उकाबैन हे नाव बहमनी राज्यातील व त्यानंतरच्या आदिलशाहीतील आहे. अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा याची मुलगी व विजापूरचा बादशहा अली आदिलशहा याची राणी चांदबिबी हिला तिचा वजीर किशवरखान याने 1582 साली साताऱ्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. त्यावेळी इसमतआरा हे नाव मिळाले. इ.स. 1700 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला घेतला त्यावेळी त्याचा मुलगा अजीमशहा याचे नावावरुन अजीमतारा हे नाव दिले आहे. उकाबैन, इसमतआरा व अजीमतारा ही नावे गेल्या सहाशे वर्षांतील आहेत. मंगलाई, सप्तवर्षी व सतारे ही नावे सहाशे वर्षांमागील असून बाराव्या शतकाच्या अखेरची असावीत. पन्हाळगडावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजांपैकी दुसऱ्या भोजराजाने पंधरा किल्ले बांधले असून त्यात सातारा किल्ल्याची नोंद मिळते. साताऱ्याच्या दक्षिणेस उभी चढण असलेल्या आणि सपाट माथ्याच्या टेकडीवर पन्हाळ्याचा शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स.1990 च्या सुमारास सातारा (अजिंक्यतारा) किल्ला बांधला असे म्हणतात.या किल्ल्याच्या भिंतींना सतरा बुरुज आणि सतरा दरवाजे होते. आणि त्यावरुन या किल्ल्यास आणि किल्ल्या जवळील गावास सातारा हे नाव पडले असावे. परंतु सातारा या शब्दाचे अनेक अर्थ आणि व्युत्पत्ती सांगण्यात येतात. सातदरा वरुन सातारा, महादरा तो सातारा, सप्ततारा पासून सातारा, अजिंक्य ताऱ्यावरील सप्त ऋषींच्या देवालयामुळे सातारा, पन्हाळगडाच्या ईशान्य दिशेकडील पूर्वीचे गाव सातर म्हणजे सातारा आणि वर सांगितल्याप्रमाणे सतरा दरवाजे असलेल्या अजिंक्यतारा (सातारा किल्ला) किल्ल्यावरुन सातारा शब्द आलेला असावा. परंतु येथील भूमीची विशेषत: वर उल्लेखिलेल्या एकाही व्युत्पत्तीने व्यक्त होत नाही, असे स्थानिक इतिहासकारांचे मत आहे. ही विशेषत: व्यक्त करणारी म्हणून सात म्हणजे विपुल या अर्थाच्या शब्दापासून सातारा संकल्पनेची व्यत्पुत्ती काही इतिहासकार मांडतात. सातऱ्सातर, म्हणजे विस्तार असा अर्थ निघतो. विस्तार करणारा तो सातारा हे विशेषनाम भाषशास्त्री दृष्टीने योग्य ठरते. अशा रीतीने सात-सातर-सातारा अशी व्युत्पत्ती अधिक सार्थ ठरते. सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युग पुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पहातो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद सर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्हयात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी पुरुषही होउुन गेले. सुमारे नऊ लक्ष चौरस मैलांच्या प्रदेशावर सत्ता चालविणाऱ्या मराठी साम्राज्याची सातारा ही एके काळी राजधानी होती. सात नद्यांचे उगमस्थान असलेल्या या जिल्हयाला अंदाजे 22 हजार माजी सैनिकांच्या पराक्रमाचा वारसा लाभला आहे.आजही सेनादलात प्रचंड संख्येने जिल्हयातील जवान तळहातावर प्राण घेऊन सीमेवर देशाची सेवा बजावीत आहेत, ही ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष म्हणावी लागेल. सैनिकी जिल्हा म्हणून उदयास आलेल्या या जिल्हयातील काही गावांना मिलिटरी गावे तर काही तालुक्यांना लष्करी तालुके म्हणून आजही संबोधले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात देश स्वातत्र्यांसाठी घडलेल्या अनेक चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिलेला हा जिल्हा पूर्वी दक्षिणेकडील वारणा नदीपासून उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत दूरवर पसरला होता. स्वातंत्र्योत्तर काळात प्रशासकीय कामकाज आणि सोईच्या दृष्टीने सातारा जिल्हयाचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन स्वतंत्र जिल्हयाची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्हयातून सांगली जिल्हा तर उत्तर सातारा जिल्हयातून सातारा जिल्हा उदयास आला.
क्षेत्र व प्रशासकीय विभाग :
जिल्हयाचे क्षेत्रफळ 10 हजार 480 चौ. कि. मी. आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या 3.40 टक्के आहे. आकारमानाच्या दृष्टीने राज्यातील एकूण 35 जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा 12 वा क्रमांक लागतो. जिल्ह्यात 11 तहसील कार्यालये कार्यरत आहेत. जिल्ह्याचे सातारा, वाई, कराड व फलटण असे 4 उपविभाग होते. आता त्यात 15 ऑगस्ट 2013 पासून कोरेगाव, पाटण आणि माण-खटाव या 3 उपविभागांची नव्याने भर पडून एकूण 7 उपविभाग कार्यरत आहेत. ग्रामीण विभागासाठी 1 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिती कार्यरत आहेत. आठ नगरपरिषदा व 1 नगरपंचायत असलेली शहरे असून जिल्ह्यात 1739 गावे आहेत. पुणे-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 या जिल्हयातून जात असल्यामुळे मोठ्या शहरांशी हा जिल्हा जोडला गेला आहे नैसर्गिक रचना :
सह्याद्रीच्या पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या, चढ उताराची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरुप आहे. मुख्य डोंगराच्या 2 श्रेणी असून त्यापैकी सह्याद्री पर्वताची सुमारे 93 कि.मी. लांबीची उत्तरेकडून दक्षीणकडे जाणारी रांग म्हणजे जिल्ह्याची पश्चिम सिमा होय. तीला बामणोलीची रांग असेही म्हणतात. महादेवाचा डोंगर व त्याचे फाटे ही दुसरी डोंगरी रांग असून ती महाबळेश्वरच्या उत्तरेस सुमारे 16 कि.मी. पासून सुरु झालेली आहे. महाबळेश्वर-कोयना खोरे परिसर सोडलातर जिल्ह्यातील इतर डोंगर सामान्यत: लहान, वृक्षरहीत व खडकाळ आहेत. महाळेबश्वर हे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असून समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची 1436 मिटर आहे. भूगर्भीय रचना :
जमीनीचा उंच सखलपणा लक्षात घेता पश्चिमेकडील प्रदेश डोंगराळ असून यामध्ये महाबळेश्वर, जावळी, पाटण व सातारा तालुक्याचा निम्मा भाग तर मधला कृष्णा काटचा प्रदेश खोलगट असून त्यामध्ये वाई, सातारा तालुक्यातील उर्वरित भाग, कोरेगाव व कराड हे तालुके येतात. पुर्वेकडील प्रदेश माळरानाचा असून त्यामध्ये खटाव, माण व फलटणचा काही भाग व खंडाळा हे तालुके येतात. या प्रमाणे जिल्ह्यातील 3 स्वाभाविक विभाग आहेत. नद्या :
जिल्ह्याचा काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात तर बराच मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. कृष्णा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कोयना, वेण्णा, कुडाळी, उरमोडी, वसना, येरळा आणि तारळी ह्या तिच्या उप नद्या आहेत. महाबळेश्वर पठाराच्या पुर्वभागात समुद्रसपाटीपासून सुमारे 1371 मिटर उंचावर कृष्णा नदी उगम पावते. मुखाजवळील पाणलोट क्षेत्र व्यतिरीक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी आणि कोयना ह्या उजवीकडील व वसना आणि येरळा ह्या डावीकडील 7 उपनदयाच्या पाणलोट क्षेत्राचा कृष्णा नदीच्या बृहत लाभ क्षेत्रात समावेश होतो. उगमापासून जिल्ह्यातील सुमारे 160 कि.मी. अंतर पार करुन कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. कोयना ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे. ती सुद्धा महाबळेश्वर पठारावर उगम पावते आणि पाटण तालुक्यातील हेळवाक या गावापर्यंत दक्षिण दिशेने वाहत जाते. त्यानंतर प्रवाहाची दिशा बदलून ती पुर्व वाहिनी होते आणि कराड शहराजवळ कृष्णेस मिळते. हे स्थान प्रितीसंगम म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरुन वाहनारी निरा आणि अग्नेय दिशेस वाहनारी माण या भीमा नदीच्या उप नदया आहेत. याशिवाय वांग व मांड या कृष्णेच्या उपनद्याही जिल्ह्यातून वाहतात. हवामान व पर्जन्यमान :
भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यातील हवामानात बदल आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये पश्चिम विभागातील हवामान थंड आणि अल्हाददायक असते. परंतु पावसाळ्यात येथे थंडी असते. वाई तालुक्याच्या सपाटीवर मात्र वर्षभर समशितोष्ण हवामान असते. जिल्ह्याच्या मध्यभागी उन्हाळ्यात उष्ण हवामान असते व हिवाळ्यात दिवसा उबदार तर रात्री थंड हवामान असते. पश्चिम व मध्यभागापैक्षा जिल्ह्याच्या पूर्वभागातील हवामान अधिक उष्ण असते.ऋतुमानाप्रमाणे तेथील हवामानात वरील तफावत आढळते. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यातील पर्जन्यमानात खूपच तफावत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान फलटण 463 मि.मी., खटाव व खंडाळा 499 मि.मी., माण 537 मि.मी. इतके कमी आहे. तर महाळेश्वर या पश्चिम भागातील उंचीवरील ठिकाणी 2344 मि.मी. इतके जास्त आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात सह्याद्री पर्वत श्रेणीमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून अगदी पश्चिम भागातील टोकास ते 5 हजार मि.मी. पेक्षा जास्त आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्याचा समावेश होतो. तर पाटण, जावळी या तालुक्यात 1700 ते 2000 मि.मी. इतके आहे. जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा खूपच कमी असून 800 ते 1000 मि.मी. असते. यामध्ये सातारा, वाई, कोरेगाव व कराड हे तालुके समाविष्ट आहेत. पूर्व भागात म्हणजेच फलटण, माण व खटाव तालुक्यात व उत्तरेकडे खंडाळा तालुक्या पावसाचे कमी असून ते सर्वसाधारणपणे 500 मि.मी. पेक्षा कमी असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1019.7 मि.मी. आहे. 2011 चे सरासरी प्रत्यक्ष मासिक पर्जन्यमान 1315 मि.मी. आहे. जमीन व तीचे प्रकार :
जमिनीची प्रतवारी भिन्न स्वरुपाची आहे. गाळांच्या थरांच्या जाडीप्रमाणे जमिनीचा पोत विविध प्रकाराचा आहे. त्यामध्ये गाळांच्या थराची जाडी कमी असल्यामुळे अत्यंत नापीक पासून ते त्या थराची जाडी कमी जास्त असल्यामुळे मध्यम ते अत्यंत सुपीक असे जमिनीचे प्रकार आढळतात. महाबळेश्वर, जावळी, वाई व पाटण या पश्चिम भागातील तालुक्यातील जमीन लाल असून लॅटराईट प्रकारच्या पाषाणापासून बनलेली आहे. डोंगर उतारावरील मातीच्या थराची जाडी कमी आहे. परंतु पावसामुळे वाहून आलेल्या डोंगराळ भागातील वनस्पतीजन्य पदार्थामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिमरित्या तयार झालेल्या खाचरातून डोंगराळ प्रदेशात सुपीक जमीन तयार झालेल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी व कोयना आणि केरा या नदयांच्या खोऱ्यातील वाई, जावळी व पाटण तहसीलमध्ये अत्यंत सुपीक व गाळाची जाड थर असेलेली जमीन तयार झालेली आहे. दख्खनच्या पठारामध्ये कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजली जाते. त्यापैकी सातारा व कराड तालुक्यातील कृष्णा काठच्या जमीन कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजल्या जातात. खंडाळा व फलटण तहसील मधील डोंगरी परिसरातील जमीन हलकी व खडकाळ आहे. परंतु निरा व तिच्या उपदयाच्या काठी असणाऱ्या जमीनी चांगल्या प्रतीच्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील नद्या व नाले यांच्या काठी असलेल्या सुपीक जमिनीचे विस्तृत पट्टे वगळता कृष्णेच्या खोऱ्याच्या पूर्वेकडील भागातील जमीन खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे नाले यामधून माळरानाचे पट्टे पसरलेले असून त्यामध्ये बाजरी सारखी हलकी पीके व जनावरांना उपयुक्त असे चांगल्या प्रकारचे गवत मुबलक प्रमाणावर वाढते. महत्वाच्या यात्रा-उत्सव : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याशिवाय नवरात्रोत्सवही उत्साहाने साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा, प्रतापगडावरील शिवप्रतापदिन, शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेवाची यात्रा, मांढरदेवी यात्रा उत्सव, पालीची खंडोबा यात्रा, औंधची यमाई यात्रा, सज्जनगड- दासनवमी उत्सव, म्हसवडची सिद्धनाथ यात्रा, पुसेगाव सेवागीरी यात्रा आदी अनेक यात्रा उत्सव जिल्ह्यात साजरे केले जातात. वारसा- साहित्य-कला- संस्कृतीचा : सातारा एक सर्जनात्मक वारसा लाभलेला जिल्हा होय. इथे अनेक तत्वचिंतक, इतिहासकार, साहित्यिक, पत्रकार, कवि जन्मास आले. जयरामस्वामी, वामन पंडित यांच्यासारखे संत तर गोविंद सागर, पठ्ठे बापूराव, आण्णाभाऊ साठे व शाहीर साबळे यांच्यासारखे शाहीर आणि रामराव चिटणीस हे बखरकार येथेच जन्मले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न. चिं. केळकर हे समाज सुधारक आणि द. भा. पारसनीस, रा. भ.गोडबोले, भाऊशास्त्री लेले, ग. ह. खरे, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे ख्यातकीर्त येथेच होऊन गेले. काका कालेलकर, बा. सी. मर्ढेकर, श्री. म. माटे, वसंत कानेटकर यासारख्या साहित्यिक नररत्नांनी सातारा जिल्हयाचा सांस्कृतिक आसमंत समृद्ध केला. कृष्णा काठी वाई येथे ज्ञानसाधनेची मोठी परंपरा निर्माण झाली. विश्वकोष निर्मितीचा त्यात विशेषत्वाने उल्लेख करावाच लागेल. रवींद्र भट, अभिनेता राजा गोसावी हे इथलेच. नवभारत संशोधन पत्रिकेने आणि अन्य नियतकालिकांनी सातारा जिल्ह्याची व पर्यायाने महाराष्ट्र राज्याची मोठी सेवा केली आहे.
सातारा परिवहन विभाग संपर्क क्रमांक
1 डिव्हीजनल कंट्रोलर, सातारा- (02162) 331850
dstatstr@yahoo.co.in
dcsatara@gmail.com
1डिव्हीजनल ट्रॅफीक ऑफिसर्,सातारा - (02162) 239479
2 डिव्हीजनल आकाउंट ऑफिसर्,सातारा - (02162) 234066
3 डिव्हीजनल पर्सनल ऑफीसर्,सातारा (02162) 238169
4 लेबर ऑफिसर्,सातारा- (02162) 238080
1 डेपो मॅनेजर्,सातारा -( 02162) 230064
2 डेपो मॅनेजर्,कराड - (02164) 222563
3 डेपो मॅनेजर, कोरेगाव (02163) 220221
4 डेपो मॅनेजर, फलटण - (02166) 222379
5 डेपो मॅनेजर,वाई ( 02167) 220680
6 डेपो मॅनेजर, पाटण (02372) 283036
7 डेपो मॅनेजर, दहीवडी (02165) 220248
8 डेपो मॅनेजर्,महाबळेश्वर ( 02168) 260485
9 डेपो मॅनेजर, मेढा - (02378) 285259
10 डेपो मॅनेजर ,पारगाव्,खंडाळा -( 02169) 252245
11 डेपो मॅनेजर्,वडुज (02161)231070
पर्यटन :- महाराष्ट्राभिमान जागवणार्या, छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणार्या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते.
इतिहास, धार्मिक स्थळे, सुंदर मंदिरे, किल्ले, अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये आणि निसर्ग यांमुळे पर्यटन पावसाळा, उन्हाळा आणि थंडीमध्येही बहरात येते.
प्रतापगड छ.शिवाजी महाराजांनी इ.स.१६५६ साली प्रतापगड बांघला. प्रतापगड महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3543 फूट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज- अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. त्यात अफझलखानाचा वध झाला. या महान पराक्रमामुळे छत्रपतींचा लौकिक चौमुलुखी पसरला. या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या दऱ्या-खोऱ्यात वाऱ्यासारखे पसरले. शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा गडावर असून गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे. इ.स.१८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिमेला १२ किलोमीटर अंतरावर परळी येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सज्जनगड. या गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी.बस जाते. गडावर जाण्यासाठी ७५० पायऱ्या चढून जावे लागते. गडावर श्रीस्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. दासनवमीला तेथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळीसुध्दा आहेत. इ.स.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.१७०० मध्ये मोगल फौजांनी तो काबीज केला. परंतु औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी सातारा परिसरातील किल्ले परत घेतले. इ.स.१८१८ मध्ये ब्रिटिश फौजांनी सज्जनगड आपल्या ताब्यात घेतला. कुसबुद्रुक, कुसखुर्द, पळसावडे परिसरात मोरघळ येथे 3 मीटर उंचीची गुहा असून तिला तीन दालने आहेत. अजिंक्यतारा सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो. अजिंक्यतारा, अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो. पूवी या किल्ल्यावरुन शहर व सभोवताच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. अजिंक्यतारा शिलाहारवंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये बांधला. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1698 मध्ये छ.राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली. महाबळेश्वर- पाचगणी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे. परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात. संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे सध्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते. पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात. कसे जाल :- जवळचा विमानतळ :- पुणे 120 कि.मी. रेल्वे- जवळचे रेल्वे स्थानक वाठार स्टे. (ता. कोरेगाव) परंतू यापेक्षा पुणे रेल्वे स्थानकच अधिक सोयीचे आहे. एसटी बसेस- पुणे- वाई- महाबळेश्वर 120 कि.मी., मुंबई - महाबळेश्वर (महाडमार्गे) 247 कि.मी. औंध पूर्वी संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. पंतप्रतिनिधींचा येथे मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा येथे पहाण्यासारखा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे पंतप्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी असलेल्या परशुराम त्रिंबकास छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. 1909 पासून भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी अधिकारारुढ होते. यमाई देवी औंध गावाच्या नैऋत्येस २४० मीटर अंतरावरील टेकडीवर यमाई देवीचे मंदिर आहे. मंदीराभोवती तटबंदी असून तिला दहा बुरुज आहेत. तटबंदीस उत्तरेस व दक्षिणेस प्रवेशद्वारे आहे. हे प्रारंभिक मध्ययुगातील तारकाकृती मंदिर असून त्यास मुखमंडप व गर्भगृह आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून आमावस्येपर्यंत असते. औंध वस्तुसंग्रहालय सातारा व कोल्हापूर या मुख्य शहरांना जोडणारे औंध हे गाव संस्कृतीचे अनेक अवशेष आजही जनत करुन आहे. त्यात आठ हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडच्या वस्तू, हस्तीदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरुम मधील मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दुर्मिळ दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते.हे वस्तु संग्रहालय आज महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात. कास व शिवसागर तलाव, बामणोली, तापोळे सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, या डोगराच्या कुशीत श्री शंकराचे स्थान आहे. श्रावणामध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. यवतेश्वरपासून पुढे १६ कि.मी.अंतरावर कास तलाव आहे. या तलावाचे पाणी सातारा शहरासाठी बंद पाईपने पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या तलावाच्या परिसरात जंगली श्वापदे आहेत. हे ठिकाण सहलीचे केंद्र बनले आहे. या तलावावरुन पुढे काही अंतरावर कोयना धरणाच्या पाणलोटातील शिवसागर हा जलाशय आहे. हा भाग दाट झाडीने व्यापलेला आहे. वन विभागाने जतन केलेला नैसर्गिक वृक्षवाढीचा प्रदेश शिवसागराच्या किनाऱ्यावर आहे. बामणोली तसेच तापोळा ही जलाशयाच्या काठावरील हिरवाईने नटलेली गावे महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिंगसारख्या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने नवीन पर्यटन स्थळे म्हणून या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. धावडशी साताराच्या वायव्येस ९ कि.मी.अंतरावर धावडशी हे गाव आहे. ब्रम्हेंद स्वामींना 1928 मध्ये छत्रपती शाहूंकडून इनाम म्हणून मिळालेले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन १७४५ मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निर्वतल्यानंतर छत्रपती शाहूनी त्यांच्या समाधीवर मंदिर बांधले. मंदिर उत्तराभिमुखी, अतिशय रेखीव आहे. गाभाऱ्यात भार्गवरामाची काळया पाषाणातील मूर्ती आहे. धावडशीच्या तांबे घराण्यात जन्मलेली मेरी झाँसी नही दुंगी ! असा नारा देणाऱ्या झाशीच्या राणीचे धावडशी हे जन्मगाव. आजही तिच्या वाड्याचे काही अवशेष या ठिकाणी पहावयास मिळतात. मेरुलिंग धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामी यांचा मठ व तळी प्रसिध्द आहेत. ठोसेघर सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा पहाण्यास पावसाळी हंगामात तरुणाई लोटलेली असते. हे स्थळ सातारा येथून 36 कि.मी. अंतरावर आहे. चाळकेवाडी येथील पठारावर उभारलेला पवन ऊर्जा प्रकल्प हेही एक आकर्षक स्थळ ठरले आहे. वाई कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई हे तर दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. येथे विश्वकोश निर्मितीचे कार्य चालू आहे. वाईनजिकच्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा सुप्रसिध्द वाडा आहे. सव्वा एकराच्या प्रशस्त जागेत बांधलेल्या या वाड्यात विविध प्रकारची कलाकुसर दिसून येते. पाली पुणे-बंगलोर महामार्गावर काशिळच्या पश्चिमेस सुमारे 7 कि.मी. अंतरावर असलेले पाली येथील खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून ते तारळी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौष महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. कोयना धरण संपूर्ण राज्याला वरदान ठरलेले कोयना हे धरण पाटण तालुक्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. 1960 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी एवढी आहे. या धरणातील जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते. तापोळा ते कोयनानगर अशी बोटींगची सुविधाही पर्यटकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. कोयनानगरचे पं.नेहरु स्मृति उद्यान कोयना जलाशयाच्या शिवसागरात भारतीय अभियंत्यांनी चौथ्या टप्प्यात लेक टॅपिंगचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. कोयनानगर परिसरात अलिकडेच अत्याधुनिक पध्दतीने उभारलेले पं.जवाहरलाल नेहरु स्मृति उद्यान हेही पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. आबालवृध्दांची तेथे वर्दळ असते. पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत. वनकुसवडे- पवनऊर्जा साताऱ्यापासून ४५ कि.मी.अंतरावर पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावर तीन पात्यांच्या विंड टरबाईनद्वारे वाऱ्याच्या गतिज ेऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्रे फिरवली जातात. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प येथे साकार होत आहे. आज येथे ८५७ पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने ३१३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते. मांढरदेव वाईच्या उत्तरेला नऊ कि.मी.अंतरावर महादेव डोंगराच्या रांगेत मांढरदेव हे ठिकाण काळुबाई देवीच्या स्थानासाठी प्रसिध्द आहे. वाई व शिरवळहून येथे जाता येते. सन 1850 मध्ये मंदिरावर शिखर बांधले. मंदिरात मध्यभागी काळुबाई देवीची स्वयंभू मूर्ती मखरात असून ती चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. येथे पौष शुध्द 15 ला मोठी यात्रा भरते. म्हसवडची श्री सिध्दनाथ यात्रा, वाई, लिंब गोवे, क्षेत्र माहुली व कराड येथे कृष्णामाईचा उत्सव भाविक मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. कारखेल (ता.माण) येथे संताजी घोरपडे यांचे स्मारक आहे. कराड येथील प्रीतिसंगम कराड येथील कृष्णा-कोयनेचा संगम हा आता केवळ संगमच न राहता ज्येष्ठ नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रितिसंगमावरील समाधीमुळे येथे स्थानिक जनतेबरोबरच राजकीय नेते, पर्यटक यांचीही वर्दळ वाढली आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनही सदैव गजबजलेले असते. येथील अद्ययावत कृष्णा हॉस्पिटलमुळे परिसरातील जतनतेस वैद्यकीय सेवेचे नवे दालन खुले झाले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन आणि वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय, मनोरे ही कराडची वैशिष्ट्ये आहेत. शिखर शिंगणापूर पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर हे मंदीर आहे. चैत्र अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा येथे पार पडतो. देवालयाच्या गाभाऱ्यातील शालूंकेत असलेली दोन लिंग शिवशक्तीची प्रतिके असून ती स्वयंभू आहेत असे मानले जाते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि नंदीमंडप यांचा मंदिरात समावेश आहे. गोंदवले दहिवडीच्या आग्नेयेस आठ कि.मी.अंतरावर गोंदवलेकर महाराजांचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथे दास संप्रदायातील या महाराजांचा जन्म 1845 मध्ये व मृत्यू 1918 मध्ये झाला. येथे त्यांची समाधी असून लाखो भाविक दर्शनाला येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पध्दतीचे असून ते 1936-37 मधील आहे. गावाच्या उत्तरेस 300 वर्षापूर्वीचे भीमाशंकराचे मंदिर सुस्थितीतील आहे. चाफळ पुणे-बंगलोर महामार्गावरील उंब्रजच्या पश्चिमेला 10 कि.मी.अंतरावर कृष्णेची उपनदी मांडच्या उजव्या तीरावर चाफळ गाव वसलेले आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. रामदास स्वामी बारा वर्षाच्या तीर्थाटनानंतर आल्यानंतर त्यांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थानी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर येथे बांधले. शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी 300 होन दान दिले. मंदीरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची 1648 मध्ये स्थापना केली. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी 1972 मध्ये नव्याने बांधून दिले. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी येतात. पुसेगाव सातारच्या पूर्वेला पंढरपूर रस्त्यावर 36 कि.मी.अंतरावर येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथींच्या अकरा लिंगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन 10 जानेवारी 1947 मध्ये येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते. त्यावेळचा रथोत्सव प्रसिध्द आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली जातात. जिल्हयातील अन्य महत्वाची ठिकाणे निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्हयातील लहान-मोठ्या गड-कोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे. तालुकावर गट-कोट किल्ल्यांची विभागणी अशी : 1) वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड, 2) जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड,मकरंदगड, वासोटा, 3) सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी, 4) पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगलीजयगड, 5) कराड: सदाशिवगड, वसंतगड, 6) फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड व 7) खटाव-वर्धनगड आणि भूषणगड आदी लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. आगाशिव डोंगर येथील लेण्या, वाई येथील मेणवलीचा नाना फडणीस यांचा वाडा आदी जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांना साद घालतात. गड-कोट-किल्ले, अनेक प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, धरण जलाशय परिसरातील निसर्ग सान्निध्याने व्यापलेली स्थळे, जंगले, तीर्थक्षेत्रे, उद्याने, पावसाळयातील धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे.
पर्यटनात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात ठिकाणाची माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी साताऱ्यातीलच असल्याने अधिकाधिक माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल.
सातारा शहर : सातारी कंदी पेढ्याप्रमाणे गोड असलेले सातारा शहर अजिंक्यताऱ्याच्या उत्तर बाजूच्या उतारावर वसले आहे, पश्चिमेस येवतेश्वर, वायव्य कोपऱ्यात मेरुलिंग, उत्तरेस चंदन वंदन, ईशान्य कोपऱ्यात जरंडेश्वर, पूर्वेस क्षेत्र माहुली-त्रिपुटी, नैर्ऋत्येस पाटेश्वर व दक्षिणेस पाठराखण करणारा अजिंक्यतारा यांच्या मध्यभागी सातारा शोभून दिसतो. गावाच्या उत्तरेला वेण्णा, पूर्वेला कृष्णा आणि दक्षिणेस उरमोडी नदी वाहते. या तिन्ही नद्या साताऱ्याला पाण्याचे दुर्भिक्ष्य कधीही भासू देत नाहीत. रात्रीच्या वेळी लिंबखिंड, शिवथर, त्रिपुटीखिंड यातून दिव्याने उजळलेला सातारा खूपच छान दिसतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुमारे १८ पेठा या गावात वसविल्या गेल्या. राजधानीचे गाव असल्याने अनेक ठिकाणच्या सरदारांनी, जहागीरदारानी आपले वाडे येथे बांधले. त्यांच्या बरोबरीने येणाऱ्या लोकांसाठी पंताचे गोटासारख्या पेठाही वसल्या. त्यातील बरेच ठिकाणी आता सहनिवास संकुल संस्कृती रुजली आहे.
सातारा शहराने बाळ कोल्हटकर, श्रीराम लागू यांच्यासारखे अभिनेते दिले. बाळ कोल्हटकर स्वतः नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व कवी होते. रंगो बापूजी गुप्ते यांच्यासारखे क्रांतिकारक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धावपटू नंदा जाधव, श्रीरंग पैलावांसारखे मल्ल, चिरमुले यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ, भाऊकाका गोडबोले यांच्यासारखे समाजधुरीण, कबड्डीपटू, नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखे विचारवंत, मल्लविद्या शिकविणारे भिडे गुरुजी, शिल्पकार, नखचित्रकार माजी आमदार खंडेराव सावंत, शाहीर फरांदे, साहित्यिक यु. म. पठाण, प्रा. शिवाजीराव भोसले, पहिली लोको ऑपरेटर सुरेखा भोसले-यादव अशा अनेक दिग्गज व्यक्ती याच मातीत घडल्या. ही यादी खूप मोठी आहे.
नवीन राजवाड्याचे २०० वर्षांपूर्वी काढलेले संकल्पचित्र
इंग्रजांशी तह झाल्यावर एल्फिन्स्टनने ग्रांट डफ या मुत्सद्दी रेसिडेंटची सातारा येथे नेमणूक केली. त्याच्या सहकार्याने प्रतापसिंह महाराजांनी गावात व कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शहरात नव्या राजवाड्यासारख्या अनेक वास्तू निर्माण झाल्या. शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले गेले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढण्यात आली. त्या माध्यमातून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन देण्यात आले. छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले. सातारा-पुणे व सातारा-महाबळेश्वर या रस्त्याचे कामही याच काळात झाले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. ग्रांट डफ हा स्वतः इतिहास संशोधक होता. त्याने मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे लेखन केले. त्याचे चार वर्षे सातारा येथे वास्तव्य होते. प्रतापसिंह महाराजांशी त्याचे स्नेहसंबंध होते. तो पोवई नाक्यावर राहत होता. तो सातारा सोडून गेल्यावर इंग्रजांनी महाराजांना खूप वाईट वागणूक दिली. त्यांचे वाराणसी येथे स्थानबद्धतेत निधन झाले.
साताऱ्याची ओळख आता विद्यानगरी म्हणूनही झाली आहे. येथे कला, वाणिज्य, विधी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, आटोमोबाइल, अध्यापन, औषधनिर्माण शास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, सीए, सीएस अशा बहुविध प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत असून, कृष्णानगर येथे नुकतीच जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जुना राजवाडा
साताऱ्यातील ऐतिहासिक स्थळे :
राजवाडा : साधारण १८२४च्या सुमारास दोन मजली राजवाड्याची निर्मिती झाली. १८५१पासून येथे न्यायालयीन कामकाज सुरू झाले. येथील दरबार हॉल अतिशय सुंदर आहे. उंच छत, तसेच भक्कम लाकडी खांब, बाजूने कारंजी, फरसबंदी, भव्य पटांगण, उंच दगडी जोती, दोन भव्य प्रवेशद्वारे हे याचे वैशिष्ट्य. याकडे शासनाचे लक्ष नाही. येथे सुंदर पर्यटनकेंद्र विकसित होऊ शकते. वाड्याच्या प्रवेशद्वारापुढे भव्य गांधी मैदान असून, येथे अनेक सभा होतात.
राजवाडा दरबार हॉल
जुना राजवाडा : छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह हायस्कूल सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले.
फाशीचा वड
फाशीचा वड : १८५७च्या उठावात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांना गेंडामाळ परिसरात फाशीची शिक्षा देण्यात आली. काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आले. यात सीताराम गुप्ते, विठ्ठल वाकनीस, केशव चित्रे, नारायण पावसकर, शिवराम कुलकर्णी यांचा समावेश होता. या ठिकाणी दर वर्षी १५ ऑगस्टला शहीदांना मानवंदना देण्यात येते. येथे स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. जुने वडाचे झाड उन्मळून पडल्याने त्या जागी नवीन झाड लावण्यात आले आहे.
अदालतवाडा : माचीवर अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी हा वाडा आहे. येथे न्यायदानाचे काम होत असे. येथे राजघराण्यातील शिवाजीराजे राहतात.
बेगम मशीद : औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसाच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी अदालतवाड्याच्या जवळच एक मशीद बांधली. शाहू महाराज इतर धर्मीयांचाही आदर करीत असत. त्यामुळे अनेक मशिदींची उभारणी झाली.
धनिणीची बाग : शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध असून, तेथे रयत शिक्षण संस्थेचे वसतिगृह व शाळा आहे. दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये, म्हणून तेथील विद्यार्थ्यांना संस्थेने राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली आहे. यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान घेतले जात नाही.
जलमंदिर भवानी मंदिर
जलमंदिर : येथे सध्या छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे व कुटुंबीय रहातात. येथील भवानी मंदिरात भवानी तलवार ठेवलेली आहे. ती फक्त दसऱ्याच्या दिवशी मिरवणुकीने पोवई नाक्यावर आणली जाते व तेथे तिची पूजा केली जाते
भवानी तलवारीचे पूजन करताना उदयनराजे भोसले
सुरुची बंगला : येथे दिवंगत अभयसिंह महाराज यांचे पुत्र शिवेंद्रसिंह महाराज कुटुंबीयांसमवेत रहातात.
पंचपाळी हौद : हा राजवाड्याजवळच आहे. मधोमध मोठे चौरस कारंजे असलेला हौद आणि त्याच्या चारही बाजूला आयताकार हौद अशी याची रचना आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हौद वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. याच्यावर आता मंदिर उभारण्यात आले आहे.
मंगळवार तळे : राजवाड्याच्या पश्चिमेस हे सुंदर तळे असून, खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. बहुधा सातारा शहरात अनेक वाडे बांधले गेले, त्यासाठी यातून दगड काढले असावेत. त्यातच कल्पकतेने साठवण तलाव निर्माण केला असावा.
कमानी हौद : इ. स १८४०मध्ये ‘कमानी हौद’ बांधण्यात आला. गुरुवार चौकातच उत्तर बाजूस मुख्य रस्त्यावर कमानी आहेत. सात कमानी आहेत. मुख्यत्वेकरून जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने हा हौद बांधला होता. यात रात्रीच्या वेळी कारंज्यावर प्रकाशझोत टाकून पाण्याचे फवारे सोडले जातात. त्यामुळे सुंदर रंगीत व थंड वातावरण निर्माण होते. याचे बांधकाम दगडांच्या साह्याने करण्यात आले आहे.
फुटके तळे : सोमवार पेठेमध्ये हा तलाव आहे. इमारतीच्या बांधकामासाठी दगड काढण्यासाठी एका ओढ्याच्या काठावर खाण काढण्यात आली होती. त्याचेच तलावात रूपांतर करण्यात आले. आता या तलावामध्ये गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे व ते शहरातील एक आकर्षण झाले आहे. फुटक्या तळ्याच्या पूर्वेकडून अदालतवाड्याकडे एक रस्ता गेला आहे. तेथे अनेक सरदार, मंत्री, कारकून राहत असत. त्यापैकी तिथे असलेल्या नातूवाड्यात नाना फडणवीसांचा जन्म झाला असावा. तसा कागदोपत्री उल्लेख नाही; पण नाना फडणवीसांचे वडील वेळासहून सातारा येथे आल्यावर नातूवाड्यात राहिले होते. अर्थात नातूवाडा आता अस्तित्वात नाही. नाना फडणवीस व नानासाहेब पेशवे यांना मुतालिकीच्या शिक्षणाची व्यवस्था शाहू महाराज यांनी केली होती.
महादरे तलाव
महादरे तलाव : सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याशी प्रतापसिंह महाराजांनी हा तलाव बांधला. शहराच्या पश्चिम भागातील काही भागाला यातून अद्यापही पाणीपुरवठा होतो. याची लांबी ८७ मीटर, रुंदी ८६ मीटर व खोली १० मीटर आहे. हा तलाव संपूर्ण घडीव दगडांनी बांधून घेण्यात आला आहे. या तलावाच्या दक्षिणेला हत्ती जलाव आहे.
चार भिंती स्मारक
चार भिंती स्मारक : सातारा शहर व पूर्वेकडे कोडोली, माहुलीपर्यंत वाढलेल्या नवीन वस्तीच्या मधोमध हे स्मारक आहे. येथून सातारचे विहंगम दृश्य दिसते. दोन्ही बाजूंनी आता रस्त्याची सोय झाली आहे. अजिंक्यताऱ्यालगत असलेल्या टेकडीवर चार भिंती येथे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ स्मारक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ ३० फूट उंचीचा असून, त्याभोवती चारही बाजूंना १० फूट उंचीच्या चार भिंती व त्याभोवती छोटी तटबंदी आहे. या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई व प्रतापसिंह महाराजांचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांचे अर्धपुतळे आहेत. स्तंभाच्या डाव्या बाजूवर १८५७च्या धामधुमीतील हिंदुस्तानचा नकाशा, तर उजव्या बाजूला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ठळक घटनांची नोंद दर्शविण्यात आली आहे.
चार भिंती स्मारक
छत्रपती शिवाजी संग्रहालय : या ठिकाणी दुर्मीळ ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा संग्रह आहे. हे वस्तुसंग्रहालय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे. येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राणे, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकरवी वापरावयाचे शस्त्र, सोनसळी, पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, बिचवा, लहान मुलांची खेळणी, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिगाडा, संगिनी, पिस्तुले असे विविध प्रकारचे युद्धसाहित्य व साधने मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखे, जरीबुट्टीचे कपडे, साड्या, पैठणी, फेटे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, अनेक प्रकारच्या पगड्या, शेले इत्यादी गोष्टी आहेत. तसेच येथे राघोबादादांची तलवारही आहे. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे. सध्या हे संग्रहालय एसटी स्टँडसमोर असून, आता स्टँडच्या उत्तरेस अद्ययावत संग्रहालय उभे करण्यात आले आहे.
बाजीराव विहीरः- हि अतिशय देखणी पायर्यांची विहीर अठराव्या शतकात छ्त्रपती शाहु महाराज यांनी बांधली. या विहीरीजवळच पहिले बाजीराव पेशवे रहायचे त्यामुळे या विहीरीला बाजीरावची विहीर म्हणतात. थोरल्या बाजीरावांनी ही विहीर बांधल्याने तिला ‘बाजीरावांची विहीर’ म्हणतात. परिसराला बाजीराव पेठ म्हणत. नंतरच्या काळात ही पेठ शुक्रवार पेठेत समाविष्ट झाल्याची वदंता आहे.पुर्ण पणे काळ्या कातळात बांधलेल्या या विहीरीला पाणी शेंदण्याची सोय केलेली आहे. महाराष्ट्रात असलेल्या पायर्यांच्या विहीरीपैकी एक महत्वाची अशी हि विहीर आहे.सातारा शहरात शुक्रवार पेठेत आहे.लिंबच्या बारामोटेच्या विहिरीची आठवण करून देणारी भव्य दगडी विहीर आहे.
ग्रामदैवत ढोल्या गणपती : या गणपतीचे मंदिर अदालतवाड्याच्या पुढे समर्थमंदिराजवळ आहे. हा गणपती आकाराने मोठा असल्याने भक्त आपल्या दैवताला ढोल्या गणपती म्हणतात.
ग्रामदैवत ढोल्या गणपती
खिंडीतील गणपती श्री कुरणेश्वर मंदिर :
ऐतिहासिक सातारा शहराच्या दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याने गेलात, की डाव्या बाजूला निवांत निसर्ग सान्निध्यात वसलेलं देवस्थान दिसतं. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान यांनी भक्तांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ सातारकरच नव्हे तर परप्रांतामधून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. देवदर्शनाबरोबर निसर्गरम्य पर्यटनाची मेजवानी ठरणारं हे ठिकाण अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत सातारा शहरापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. नागमोडी वळणाच्या स्वच्छ आणि हिरव्यागार घाटात ते वसलेलं आहे. शहरातून तिथे जण्यासाठी खासगी वाहन हवं किंवा शहरातून रिक्षाही मिळू शकते. या देवस्थानला पायी जाणा-यांची संख्या आधिक आहे. या परिसरात गणपतीबरोबरच कुरणेश्वर महादेव मंदिर आणि दत्त मंदिरही आहे. छत्रपती राजराम महाराजांनी १६९८ साली सातारा ही राजधानी केली. तेव्हापासून अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण उतारावर गर्द झाडीत ही दोन ठिकाणं होती. मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाने साता-यावर स्वारी करून ही राजधानी बळकावण्याचा प्रयत्न केला. साता-याजवळ उत्तरेला करंजे गावी तळ ठोकला. मुलगा अझिमशहा याला सध्याच्या शहापूर ते सज्जनगड भागात तळ देण्यासाठी पाठवलं. औरंगाजेबाने कपटनीतीने अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला आणि सज्जनगडावर स्वारी केली. पावसाळ्यात माराठ्यांच्या गनिमी काव्याला बळी पडत हजारो सैनिक मरण पावून हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांनी ताराबाईंकडून किल्ला जिंकून सातारा ही राजधानी केली.पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाजी चासकर यांनी १७२३मध्ये हे दगडी मंदिर बांधले. अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा पडल्यावर देवभक्तांनी मुसलमानांकडून मूर्ती फोडली जाऊ नये म्हणून पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारात नवी मूर्ती बसवल्याचं सांगितलं जातं. ही मूर्ती तिचं स्वरूप लक्षात घेता दगडाची नसावी असं वाटतं. आजही याच मूर्तीच्या मागे मूळ आहे. ती मोकळी करण्याचा विचार अनेकदा झाला पण नकार दृष्टांत झाल्याने आहे त्याच मूर्तीची पूजा सुरू राहिली, हे या मंदिराचं आणि मूर्तींचंही वैशिष्ट्य आहे. काही काळानंतर सातारा शहरातील अनेक गणेशभक्त नित्यदर्शनासाठी येऊ लागले. त्यानंतर देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आता ट्रस्टतर्फे वर्षामध्ये भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवसांचे दोन उत्सव, मंदिरामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी केले जातात. ट्रस्टमार्फत मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यासाठी दुमजली इमारत, तसंच परिसरात सुशोभित बालोद्यान, वृक्षारोपण, पथदिवे इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत. भक्तांच्या सहकार्यातून मंदिरापर्यंत दगडी पाय-या, बालोद्यान, ध्यानकेंद्र, आध्यात्मिक अभ्यासिकाही सुरू आहे. निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने बहरलेला हा परिसर गणेशभक्तांबरोबरच पर्यटकांचंही आकर्षण ठरला आहे. श्री गणेश मंदिराच्या पूवेर्स दगडी पाय-या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुरणेश्वर मंदिर असून हा निवांत आणि रमणीय परिसर पर्यटकांसाठी वर्षभर खुणावत असतो. अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण उतारावर बोगद्यापलीकडे जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर हे सातारकरांचे श्रद्धास्थान आहे. हे आवडीने फिरायला जाण्याचे, सहलीचे ठिकाण आहे. दिवंगत भाऊकाका गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. तेथे आता आयुर्वेदीय वृक्ष उद्यान साकारत आहे. हे अत्यंत शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे.
खिंडीतील गणपती
शंकराचार्य मठ : शनिवार पेठेतील माची भागात हा मठ असून, येथे संस्कृत अध्ययन केले जाते. कांचीकामकोटीचे शंकराचार्य येथे मुक्कामाला असताना पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रपती संजीव रेड्डी त्यांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. येथून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी मारुती मंदिरमार्गे बांधीव पायरी मार्ग आहे. अरुण गोडबोले यांनी पुढाकार घेऊन, देणग्या गोळा करून पायऱ्यांचे बांधकाम केले आहे.
शकुनी गणपती : गुरुवारपेठेत हे मंदिर असून, नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
पंचमुखी गणपती
पंचमुखी गणपती : अलीकडील काळातील हे टुमदार मंदिर असून, भारतातील पाच मुखे असलेल्या काही मोजक्या पंचमुखी गणपती मंदिरांपैकी एक आहे. पंचमुखी गणपतीच्या खालील बाजूस एक जुने मारुती मंदिरही आहे.
गारेचा गणपती : चिमणपुरा पेठेत हे मंदिर असून या गणपतीला पेशव्यांनी सोन्याचा मुकुट दिला आहे.
गारेचा गणपती
गजानन महाराज मंदिर : दिवंगत भय्यासाहेब भुर्के यांनी या मंडळाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. अनिल देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साह्याने मंदिर पूर्णत्वास नेले. साताऱ्यात संत गजानन महाराजांचे असंख्य भक्त आहेत. त्यांनी वर्गणी काढून हे मंदिर सन १९९६मध्ये उभारले. या मंदिराची उभारणी होत असताना थोडीफार माझी सेवा रुजू करण्याची संधी मला मिळाली. मंदिराचे प्रारूप, संकल्पचित्र व उभारणी यामध्ये मला खारीचा वाटा उचलता आला, हे माझे भाग्य.
गजानन महाराज मंदिर
साईबाबा मंदिर : कोल्हापूर रस्त्यावर साईबाबा भक्तांनी देणगीतून हे मंदिर उभारले आहे. साई भक्त येथून दर वर्षी शिर्डीपर्यंत पायी दिंडी काढतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबवितात.
नटराज मंदिर
नटराज मंदिर : कांचीकामकोटी येथील शंकराचार्य सातारा येथे मुक्कामास असताना त्यांच्या आशीर्वादाने शामण्णा शानभाग यांनी कृष्णानगर येथे दाक्षिणात्य पद्धतीच्या चार गोपुरे असलेल्या उत्तर चिदंबरम् (श्री नटराज) मंदिराची उभारणी केली. आज हे भाविकांचे व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
दक्षिणात्य शैलीचे उत्तर चितंबरम हे साताराच्या कृष्णानगर या ठिकाणी आहे. दक्षिण स्थापत्यशास्त्राचा सुंदर आविष्कार येथे पाहायला मिळतो. हे मंदिर तामिळनाडूच्या चिदंबरम येथील श्री नटराज मंदिराची प्रतिकृती आहे. सन १९८०-१९८१ साली शामराव शानभाग यांनी हे मंदिर स्वखर्चातून बांधले आहे. मंदिराच्या शुभ कार्यासाठी भोसले घराणे, राजनीतिक मंडळी, व इतर लोकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिली. मूर्तीची प्रतिष्ठापना कांची पीठाचे अधिपती श्री. नरेंद्र सरस्वती यांचे हस्ते करण्यात आली. इथली मूर्ती भगवान शंकरांच्या तांडव नृत्य करणाऱ्या नटराज रूपाला समर्पित आहे. मूर्ती पंचधातूची असून, साडेचार फूटी उंची आहे.
भगवान नटराजांच्या मुख्य मंदिराव्यतिरिक्त, मंदिर परिसरात गणपती मंदिर, हनुमान मंदिर, राधा-कृष्ण मंदिर, शिवलिंग मंदिर, नवग्रह मंदिर, आदि शंकराचार्य मंदिर आणि अयप्पा स्वामी मंदिर आहेत. या मंदिराचे बांधकाम प्रसिद्ध शिल्पकला कलाकार श्री एम. एस. गणापथी स्थापथी आणि त्यांचे बंधू श्री. एम. मुथय्या स्थापथी यांच्या हस्ते संपन्न झाली होती. मंदिर समूहाच्या भेावताली चौकोनी आकाराची उंच तटभिंत आहे. या तटभिंतीला चार मुख्य दिशांना प्रत्येकी ६५ फूट उंचीची चार गोपुरे द्वार आहेत. त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सरकारने खर्च दिल्याने त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. भरतनाट्यम मधील १०८ कर्ण यांची शिल्प येथे पाहायला मिळतात.
बिरोबा मंदिर : कोडोली औद्योगिक वसाहतीत हे धनगर समाजाचे जुने देवस्थान असून, येथे विकासाची कामे चालू आहेत. हे ठिकाण निसर्गरम्य आहे.
गेंडामाळ दत्तमंदिर : सातारा मोळाचा ओढा रस्त्यावर पश्चिमेला फर्लांगभर अंतरावर हे रम्य ठिकाण आहे.
ध्यान मंदिर : गेंडामाळावर हे सुंदर, शांत श्रीराम मंदिर असून, परिसर खूप छान आहे.
कोटेश्वर मंदिर : साताऱ्याच्या पश्चिमेला शुक्रवार पेठेत हे सुमारे २०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी असते.
पेढ्याचा भैरोबा
पेढ्याचा भैरोबा : साताऱ्याच्या पश्चिमेला दरे गावाच्या हद्दीत येवतेश्वरच्या डोंगरात हे देवस्थान आहे. देवळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. अत्यंत हवेशीर, निसर्गरम्य ठिकाण असून, येथून सातारा शहराचे दर्शन होते.
पारशी आग्यारी : साताऱ्यामध्ये पूर्वीपासून अनेक पारशी कुटुंबे राहत असून, सदरबझारमध्ये त्यांचे अग्निपूजा मंदिर आहे. जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेले ठिकाणही आहे.
भीमाबाई आंबेडकर समाधी : जरंडेश्वर नाक्याच्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रींची समाधी आहे. तेथे नव्याने स्मारक बांधण्याचे काम चालू आहे.
चर्च : सदरबझारमध्ये वृक्षराजीत असलेले अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च आणि पोवई नाक्यावरील टिळक मेमोरियल चर्च अशी दोन चर्चेस आहेत.
महानुभाव मठ : महानुभव पंथाचे प्रणेते श्री चक्रधर स्वामी आहेत. इ. स. १९१२मध्ये स्व. बाबा मोतीवाले यांनी या मठाची स्थापना केली.
साताऱ्यातील संस्था :
मराठा विद्याप्रसारक संस्था : रावबहादूर संभाजीराव दुदुस्कर यांनी आनंदराव कदम व मारुतराव देशमुख यांच्या सहकार्याने एक सप्टेंबर १९०७ रोजी मराठा विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. शेतकरी, कामकरी वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वसतिगृहाची स्थापना केली. या संस्थेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी १४ एप्रिल १९३३ रोजी राणीसाहेबांबरोबर भेट दिली होती. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मातोश्री रहिमतपूरचे सरदार माने यांच्या कन्या असल्याने वसतिगृहाचे नामकरण महाराणी जमनाबाई बोर्डिंग असे करण्यात आले. संस्थेमार्फत कला, वाणिज्य महाविद्यालयही सुरू करण्यात आले.
शिवाजी उदय मंडळ : सातारा येथील ही संस्था शारीरिक शिक्षण, कबड्डी, खोखो, मल्लखांब अशा देशी खेळांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे. या संस्थेने अनेक नामवंत खेळाडू निर्माण केले. गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे दैनंदिन कार्यक्रम चालू असतात. अत्यंत शिस्तीने गणपती उत्सवात भाग घेणारी ही संस्था आहे. राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे आयोजन येथे केले जाते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी
रयत शिक्षण संस्था : चार ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. सध्या पोवई नाक्यावरच संस्थेचे मुख्यालय असून, कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी आहे. हे एक आदर्शवत स्मारक आहे. येथे विधी महाविद्यालय, जिजामाता अध्यापन पदविका विद्यालय, सयाजीराजे हायस्कूल व वसतिगृह आहे. संस्थेच्या एकूण शाळा ४३८ असून मुलींच्या शाळा २६ आहेत. इंग्रजी माध्यम शाळा सहा, महाविद्यालये ४२, आश्रम शाळा आठ, तर शेती शाळा १७ आहेत. संस्थेची ८० वसतिगृहे असून, मुलींची वसतिगृहे २९ आहेत. कर्मचारी संख्या १६ हजार १७२ असून, प्रशासकीय कार्यालये आठ आहेत. एकूण विद्यार्थी चार लाख ५४ हजार १६४ आहेत. या संस्थेचा एवढा मोठा वटवृक्ष महाराष्ट्रात पसरला आहे.
कर्मवीरांचा वडाचा पार. डॉ.अनिल पाटील व विद्यार्थी.
हिंगणे शिक्षण संस्थेची रा. भि. काळे कन्या शाळा, डेक्कन एजुकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, अनंत हायस्कूल, विवेकानंद शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री कॉलेज व हायस्कूल अशा अनेक जुन्या, नव्या संस्था साताऱ्यात कार्यरत आहेत.
क्रांतिस्मृती : या संस्थेतर्फे शारीरिक शिक्षण अध्यापक विद्यालय चालविले जाते.
अर्कशाळा : आयुर्वेदीय अर्कशाळा साताऱ्यात १९२६पासून कार्यरत आहे. स्वतः अॅलोपॅथीचे पदवीधर असलेले सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. एम. एन. आगाशे यांनी ही संस्था स्थापन केली.
युनायटेड वेस्टर्न बँक : आता ही बँक आयडीबीआय बँकेत विलीन झाली आहे. त्या बँकेचे मुख्यालय सातारा येथे होते. साताऱ्यातील पहिली बहुमजली इमारत या बँकेची होती. या बँकेचे अस्तित्व ही सातारकरांच्या अभिमानाची गोष्ट होती. तिचे नाव पुसले गेले, याची खंत सातारकरांना राहिली आहे.
युनियन क्लब : दादासाहेब करंदीकर, बळवंतराव सहस्रबुद्धे, दत्तोपंत चितळे असे कार्यकर्ते खंडेराव चिटणीस यांच्या घरी एकत्र जमून सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी विचारविनिमय करीत असत. ही जागा अपुरी पडू लागल्याने स्वतंत्र जागा घेऊन १८९७मध्ये युनियन क्लबची स्थापना करण्यात आली.
इतर काही ठिकाणे : गोरा राम मंदिर, काळा राम मंदिर, खजिन्याची विहीर, मोती तळे मंगळाई, बोगद्याजवळील मारुती, शनी मारुती मंदिर, पुष्कर मंगल कार्यालयाच्या मागील कार्तिकस्वामी मंदिर, कलावतीदेवी मंदिर, खण आळीतील जैन मंदिर, शनिवार पेठेतील राममंदिर, कुबेर गणपती, काशीविश्वेश्वर मंदिर, गोलमारुती, शनिवार विठोबा, शाहू कलामंदिराजवळील विठोबा, राजवाड्याजवळील मारुती अशी अनेक देवळे येथे आहेत.
कृष्णेश्वर मंदिर, सातारा
पर्यटन म्हणजे नेहमी लांबच जायला हवं असं काही नाही. काही वेळा आपल्या अगदी जवळ असणारी ठिकाणे आपण बघितलेली नसतात. आणि बघितल्यानंतर एवढे जवळ असूनही एवढं सूंदर ठिकाण कसं काय माहीत नव्हतं अशीच भावना होते.
असच साताऱ्याच्या कृष्णेश्वर मंदिराबद्दल ऐकलं होतं पण कधीही जायचा योग आला नव्हता. काही दिवसांपूर्वी ह्या मंदिरामध्ये जाऊन आलो.
मंदिर आणि परिसर खूप मस्त आहे. मूळ मंदिर दगडी आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. महादेवाची सूंदर पिंडी आणि समोर नतमस्तक असणारा नंदी मनाला समाधान देऊन जातो. सभामंडपामध्ये सहा दगडी पूर्णस्तंभ आहेत. शिखर विटांमध्ये आहे. हे देवालय पहिल्या बाजीराव पेशव्यांचे मामा (सासरे ) कृष्णाजी चासकर यांनी महादरे तळ्याजवळ सातारा शहराच्या पश्चिम टोकास शके १६४५ म्हणजेच २७ जानेवारी १७२४ मध्ये बांधले. तेव्हा या भागाला सदाशिवपुरा असे म्हणत होते. मंदिर बांधल्यानंतर पाच वर्षांनी व्यंकटराव घोरपडे या भागात वाडा बांधून राहू लागले. तेव्हापासून या परिसरास व्यंकटपुरा पेठ असे म्हणू लागले.
इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराबाहेर असणारे पाण्याचं टाकं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला ओढ्याच्या काठाला एक छोटंस पण अतिशय सूंदर पण दुर्लक्षित असं पाण्याचे टाके आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. टाक्यांची रचना साधारणपणे पाण्यापर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या, एक दगडी कमान आणि आत मध्ये एक छोटेसे सूंदर दालन अशी आहे. थोडे उतरल्यानंतर डाव्याबाजूला एक दगडी कमान दिसते. दगडी कमानीमधून आत गेल्यानंतर एक छोटे दालन आहे. तिथे चार पाच जण सहज बसू शकतील. वरच्या बाजूने पाण्यापर्यंत जाण्यासाठी सुंदर दगडी पायऱ्या आहेत. सध्या इथे भरपूर झाडी वाढली आहे.
व्यंकटपुरा पेठेतल्या गोखले हौदापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपण मंदिरापाशी येऊन पोचतो.
हे मंदिर आणि पाण्याचे टाके खरचं एकदा तरी बघायलाच हवे.
सातारा शहरातील आणखी काही तळी :-
मराठ्यांच्या अखेरच्या राजधानीची ओळख श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असली तरी हे शहर अत्यंत कौशल्याने व नियोजनपूर्वक वसवले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी. यवतेश्वर मंदिरामागे तलाव बांधून त्याचे पाणी नैसर्गिक उताराने साताऱ्यात आणले. त्याच्या वितरणासाठी कमानी हौद, पंचपाळे हौद, छत्री हौद तसेच पाण्याच्या डब्या आदी व्यवस्था करण्यात आली.
इमामपुरा तळे ! वाढत्या शहराची गरज पूर्ण करण्यासाठी थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी अनेक सुधारणा घडवल्या. एक लाख रुपये खर्च करून त्यांनी १८२९ मध्ये महादरे तलाव बांधला. त्याच्यावरच्या बाजूस असलेल्या तळ्यात महाराजांचा हत्ती पाणी पित असे त्यामुळे त्याला हत्ती तळे नाव पडले. फुटक्या तळ्याच्या परिसरास ‘इमामपुरा’ नावाची वस्ती होती. त्यावरून त्याला ‘इमामपुरा तळे’ असे संबोधण्यात येत असे. नंतर ‘फुटके तळे’ हे नाव रुढ झाले. या तळ्यात पूर्वी फारसे पाणी नसायचे. कास पाटाने शहरात पाणी येऊ लागल्यानंतर या तळ्याचा झिरप वाढल्याचे दाखले मिळतात.
मोती तळे प्रतापसिंह महाराजांनंतर गादीवर आलेल्या अप्पासाहेबांनी जुन्या पालिकेनजीक पाण्याची सोय म्हणून तळे बांधले. रेशीम धुण्यासाठी व्यावसायिक या ठिकाणी येत. या तळ्यातील पाण्यामुळे रेश्माला मोत्यासारखी चकाकी यायची. त्यावरून त्याला ‘मोती तळे’ नाव पडले.
रिसालदाराचे तळे मल्हार पेठेत पोलिस मुख्यालयाजवळ प्रतापसिंह महाराज यांच्या घोड्यांची पागा होती. या घोड्यांची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यास रिसालदार म्हणत. दौलत खान नावाच्या रिसालदाराने घोड्यांच्या व्यवस्थेसाठी दगडी बांधकामात मोठे तळे बांधले. तसा शिलालेख आहे. पोलिस प्रशासनाने जीर्णोद्धार केल्याने आजही या तळ्याचे पाणी वापरात आहे. १८४४ च्या सुमारास नव्या राजवाड्याच्या बांधकामासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. त्या खड्याच्या ठिकाणी औंधच्या पंतप्रतिनिधींनी आखीव-रेखीव तळे बांधले. पेठेच्या नावावरून ‘मंगळवार तळे’ हे नाव रुढ झाले, असे असले तरी पूर्वी त्याला ‘पंतांचे’ अथवा ‘श्रीपतरावांचे तळे’ म्हणत.
साखर तळे जुन्या मोटार स्टॅंडवर, बुधवार पेठेच्या बाजूस एक तळे आहे. या जुन्या वाहनतळावर आलेला एक साखरेचा ट्रक गाडी मागे घेत असताना संरक्षक कट्टा नसलेल्या तळ्यात कोसळला. ट्रकभर साखर तळ्यात विरघळल्याने या तळ्याला पुढे ‘साखर तळे’ संबोधण्यात येऊ लागले. ५० दशकांत घडलेली ही दुर्घटना आजही ज्येष्ठांच्या स्मृतीत आहे. कॅम्प भागातील लष्करी छावणीसाठी प्रतापसिंह महाराज यांच्या काळात गोडोलीत तलाव बांधण्यात आला. हाच आता ‘गोडोली तळे’ नावे ओळखला जातो. अति क्षारयुक्त पाण्यामुळे विहिरीचे पाणी खारट लागायचे, त्यामुळे मंगळवार पेठेतील विहिरीस ‘खारी विहीर’ नाव पडले, अशा आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात. फुटके तळे, रिसालदाराचे तळे अशी मोजकी उदाहरणे सोडली तर उर्वरित वास्तूंची कचराकुंडीसारखी अवस्था आहे. मोती तळे हे नावालाच शिल्लक आहे. मंगळवार तळे त्याच मार्गावर आहे. साखर तळे जलपर्णीने बुजले आहे. त्याच्या भोवती पडलेले कचऱ्याचे कोंडाळे दुर्लक्षाची साक्ष देते. इतिहास अभ्यासक नीलेश पंडित
कसे जाल? कोठे राहाल साताऱ्यात?
सातारा रेल्वेने, तसेच रस्तेमार्गाने जोडलेले आहे. दिल्ली, बेंगळुरू, मदुराई, मुंबई, जोधपूर, अहमदाबाद येथून रेल्वेने जाता येते. पुणे, कोल्हापूरपासून सुमारे दोन तासांत जाता येते. हे ठिकाण राष्ट्रीय हमरस्त्यावर आहे. जवळचा विमानतळ पुणे १२० किलोमीटर. संपूर्ण वर्षभर येथे येऊ शकता. सर्व मोसमांत पर्यटकांची वर्दळ असते. जेवणाखाण्याची, राहण्याची चांगली सोय आहे.
सातारा तालुक्याचा पश्चिम दिशेचा परिसर :-
सर्वात आधी निसर्गरम्य अश्या सातारा तालुक्याच्या पश्चिम भागाला भेट देउया. या परिसरात पावसाळी हंगामात येणार्या फुलांमुळे जगप्रसिध्द्द झालेले कास पठार्,वजराई ,कास,दत्तवाडी-केळवली,ठोसेघर हे धबधबे, बामणोली,वासोटा अशी ठिकाणे तर यवतेश्वर, देवकळचे मंदिर्,परळी गावाचे शिवमंदीर्,सज्जनगड, समर्थसृष्टी अशी बरीच ठिकाणे येतात.
डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर
सातारा शहरच्या पश्चिमेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळभैरवनाथचे देवस्थान आहे. त्या देवाची यात्रा ही या भागातील सर्वांत पहिली यात्रा असते.
हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत.
शेजारी काळभैरवनाथाचे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती द्रविडीयन पध्दतीची असून मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे.
या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे.
या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवला आहे.
मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतरही काही मूर्ती ठेवलेल्या आढळतात.
मंदिराच्या पश्चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या पध्दतीची असून सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही.
यवतेश्वर डोंगराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1230 मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढ्याचा भैरोबा म्हणतात. काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी यवतेश्वर येथे महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. येथूनच दूरवर कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर व मेरुलिंगाचे दर्शन घडते. सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते. डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेच्या टप्प्यात येते. साताऱ्यातून दर अर्ध्या तासाला येथे येण्यासाठी एसटी, तसेच खासगी वाहनाची सोय आहे.
या देवस्थानाची यात्रा दरवर्षी अश्विन अमावस्येला भरते. या यात्रेची सर्व जबाबदारी यवतेश्वर, सांबरवाडी, आंबेदरे येथील ग्रामस्थ पार पाडत असतात. पालखीची भव्य अशी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघून ती पालखी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या देवाच्या आंब्याच्या झाडाजवळ जावून त्या झाडाचे पूजन केले जाते. या देवाच्या आंब्याच्या झाडाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी झाडाला एका दिवसात मोहोर येऊन पूजन झाल्यानंतर आंबे येतात. झाडाचे पूजन केल्यानंतर गावातील देवाचा भक्त त्या झाडावर चढून झाडाला आलेली आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून खाली आणून ती पालखीत ठेवली जाते. तेथून पालखी व त्या भक्ताला खांद्यावर घेऊन पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत रवाना होते. या आंब्याचा मोहोर व आंबा आला की यात्रा झाली, असे मानले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, यवतेश्वरावर बऱ्यापैकी झाडी असल्याने थंडावा नेहमीच असतो. येथून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, मेरूलिंग डोंगररांगा स्पष्ट दिसतात. यवतेश्वराला डावीकडे वळण्याऐवजी तसेच सरळ गेलात की, अंदाजे 18 ते 20 किलोमीटरवर आपण एका मोठ्या तलावाशी येऊन पोचतो. हाच तो बहुचर्चित कास तलाव. यवतेश्वर ते कास हा रस्ता म्हणजे, अपरिमित आनंदाचा ठेवा. अनेक प्रकारची आणि रंगीबेरंगी फुलपाखरे, पावसाचे पाणी आकंठ पिऊन तृप्ततेने डवरलेले वृक्ष, असंख्य नवनवी झुडपे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर हे घाटावरचे जिल्हे पावसाळ्यात नेहमीच असा रूबाब धारण करून असतात. या सर्वांच्या जोडीला भारद्वाज, कोकीळ, बुलबुल, खंड्या, बंड्या, कोतवाल, रॉबिन, दयाळ असे अनेक पक्षी चिमणी-कावळ्यांच्या संख्येने आपली साथ देत असतात. श्रावणात येथील वातावरण अगदी प्रसन्न असते. येथील महादेव अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येतात.
सोमेश्वर मंदिर,देवकळ (सातारा)
सरत्या पावसात फुलणार्या फुलांमुळे अलिकडेच प्रसिध्दीच्या झोतात आलेले कास पठार किंवा बॅकवॉटर राईड आणि वासोट्यामुळे लोकप्रिय असलेले बामणोली, तापोळा या ठिकाणी गर्दी ओसंडून वहात असते.
मात्र वाटेत लागणारे देवकळ हे गाव आजही अज्ञात आहे.सरत्या पावसात विशेषतः श्रावणात भेट देण्यासाठी हि एक आदर्श जागा आहे.
सातार्यावरुन बामणोलीला निघाले कि देवकळ या गावाची पाटी येते. या फलकांची थोडी दुरावस्था झाली होती. त्या फलकाचे वाचन केल्यावर कळले कि येथे पांडवांनी एका रात्रीत बांधलेले सोमेश्वर मंदिर आहे.आणि पांडव मंदिर एका रात्रीत कसे बांधतात हे पाहण्यासाठी नवनाथांनी तेथील एका दगडाला कोरून तेथे गुफा बनवली
सध्या तेथे नवनाथांची मूर्ती व शिवलिंग आहे. हे फलक वाचून आता तिथे जाण्याची उत्कंठता अजून वाढू लागली होती. मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेले रस्ते सुस्थितीत आहेत.
मंदिर पांडवांनी उभारले आहे अशी स्थानिक लोकांची समजुत असली तरी त्यात तथ्य नाही.पण दगडात बनविलेले हे मंदिर आवर्जून भेट द्यावे असे नक्कीच आहे.
आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला जो ऐतिहासिक वारसा लाभला आहे तो खरंच खूप विलोभनीय आहे.परंतु सध्या या ऐतिहासिक वारस्याला हवे तसे जपले जात नाही याची खंत मनात आहे.
मंदिराला भेट देउन वळायचे ते शेजारी असलेल्या दगडात कोरलेल्या गुहेला भेट देण्यासाठी
गुहेच्या आतमध्ये शिवलिंग आहे.
तसेच नवनाथांचे मुखवटे आहेत.जर आपण कास, बामणोलीला जाणार असाल तर या ठिकाणाला जरुर भेट द्या.
पेट्रेश्वर मंदिर :-
सातार्यावरुन कासच्या दिशेन निघाले कि अटाळी,कासाणी अशी गावे लागतात.कास जवळ येईल तसे ताशीव कडे असणारी एक टेकडी नजरेत भरते.एखादा किल्ला असावा अशी दिसणार्या या टेकडीच्या पोटात दक्षिणाभिमुख गुंफा आहे.अश्या अनगड ठिकाणाचा देव म्हणजे महादेव.इथेही हा पेट्रिश्वर स्वरुपात आहे.थोडावेळ ईथल्या निरव शांततेत बसून समोर दिसणार्या उरमोडी धरणाच्या बॅकवॉटरचे दृष्य आणि सज्जनगड परिसरातील डोंगराचा नजारा इथून दिसतो.उत्तर बाजुला कण्हेर धरणाचे दृश्य दिसते,इथून कास पठार अगदीच जवळ आहे,
एकीवचा धबधबा
जावळी तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले असून पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे दिसतात. त्यातलाच एक धबधबा म्हणजे मेढ्याच्या पश्चिमेला असलेला एकीवचा धबधबा. दोन टप्प्यांत हा धबधबा कोसळत असल्याने तो पर्यटकांवर मोहिनी टाकतो.
का सकडून येणाऱ्या पाण्याने हा धबधबा तयार झाला आहे. एकीवच्या अगदी मध्यभागी हा धबधबा असून एकीवमधून तो दुंद गावाच्या वरच्या बाजूला कोसळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कोणताही त्रास पडत नाही.
पर्यटनासाठी कासला जाताना अगदी जवळच हा धबधबा असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गेला आठवडाभर जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा धबधबा ओसंडून कोसळत आहे. पंचक्रोशीत या धबधब्याला ‘पाबळ’ नावाने संबोधले जाते. या धबधब्याच्या वरच्या भागात काळजी घेऊन भिजता येते. मात्र, खालचा कोसळणारा भाग दुरूनच पाहावा लागतो. तरीही धबधबा पाहताना पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कसे जाल... मेढ्यातून कुसुंबी-दुंदमार्गे एकीवला जाता येते. तर साताऱ्याकडून आल्यास कास रस्त्यावर आटाळी गावाजवळून एकीवला रस्ता गेला आहे. दोन्ही रस्ते सुस्थितीत असून जाताना कण्हेर धरणाचे आणि डोंगरदऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
कासाणी धबधबा:-
सातारा शहरातून कास पठाराकडे निघालो कि साधारण २० कि.मी.वर कासाणी गाव लागते.या गावानजीक घाटाई देवीचे मंदिर आहे जे सुप्रसिध्द आहे.मात्र याच गावाशेजारुन पावसाळ्यात नितांतसुंदर धबधबा वाहतो,याची माहिती मात्र फार थोड्या जणांना आहे.घाटाई देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत एक ओढा लागतो.हाच ओढा पुढे नागमोडी वहात एका कड्यावरुन झोकून देतो आणि डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा तयार होतो.हाच तो "कासाणी धबधबा".
कासाणी धबधब्याला कासाणी गावातून जायचे तर लांबचे अंतर पडते.मात्र जवळच्या मार्गाने जायचे तर अटाळी गावातून जाणारी वाट सोयीची आहे.अर्थात या वाटेने जायचे तर पायी चालण्याचे श्रम मात्र घ्यावे लागेल.सातार्यावरुन कासकडे निघाले कि १५-१६ कि.मी.वर अटाळी गाव डाव्या हाताला म्हणजे दक्षिण बाजुला लागते.या ठिकाणी हॉटेल सह्याद्री म्हणून छोटे हॉटेल लागते.याठिकाणी आपण नेलेली दुचाकी किंवा चारचाकी वहान ठेवावे.या हॉटेलच्या मागून अटाळीला जाणारा रस्ता आहे.या रस्त्याने जाउन कोण्या गावकर्याला कासाणीकडे जाणारा रस्ता विचारावा,डांबरी सडक सोडून आपली वाटचाल आता लाल मातीच्या रस्ताने सुरु होते.मधूनच पावसाच्या सरी येत असतात.वाटेवर अनेक प्रकारची ऑर्कीडस रानफुल पहायला मिळतात.
हिरडा,बेहडा,करवंद,शतावरी अश्या वनस्पतीच्या दाटीतून आपली तासाभराची वाटचाल होते.यादरम्यान बर्याचदा गुडघाभर पाण्यातून जावे लागते. यानंतर आपल्याला धबधब्याच्या पाण्याचा आवाज एकु येउ लागतो.या ठिकाणाहून आपल्याला परळी धरणाचा विस्तृत जलाशय आणि घाटाई मंदिराचा परिसर दिसतो.पावसाळ्यात या ठिकाणचा उतार शेवाळलेला आणि निसरडा असतो. कारवीच्या झाडांचा आधार घेत वेडीवाकडी चाल ठेवत काही अंतर गेलो कि उजव्या बाजुला पाण्याचा शुभ्र प्रवाह ६०-७० फुट कोसळताना दिसतो.
दरीच्या दोन्ही बाजूना उंबराचे वृक्ष आहेत.त्याचा आधार घेउन धबधब्याच्या पाण्याच्या जवळ जाता येते.मात्र जोराचा पाउस असताना पाणी गढूळ आणि वेगाचा प्रवाह असेल तर पाण्यात पाय घालू नये.हाच प्रवाह पुढे दिडशे फुट वहात जाउन पुन्हा एका कड्यावरुन खाली कोसळतो.इथे मात्र थेट कोसळणारी दरी असल्यामुळे पुढे जाउ नये.
कासाणी धबधब्याच्या खालच्या बाजुला एक छोटा पुल आहे.कास तलावाचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून सातारा शहराला पुरवले जाते.त्या पाईपलाईनला आधार देण्यासाठी हा पुल उभारला आहे,या पुलावरुनच कासाणी गावचे ग्रामस्थ अटाळीमार्गे शॉर्ट्कट पकडून सातार्याला येत असतात.या पुलावर उभे राहिल्यास आपण थेट कासाणी धबधब्याच्या समोर उभे असतो.
पावसाळी भटकंतीचा आस्वाद घेण्याची इच्छा असणार्या आणि काही वेगळे बघायची ओढ असणारे,त्यासाठी प्रसंगी थोडा त्रास सहन करायची तयारी असेल तर त्यांच्यासाठी हा कासाणी धबधबा चांगला पर्याय आहे.
कास पठार :-
पावसाळा सुरू झाला, की सह्याद्री मध्ये रानफुलांचा उत्सव सुरु होतो. हा उत्सव पाहण्याकरिता डोंगरभटक्यांची पावले मग आपोआपच सह्याद्रीकडे वळू लागतात. श्रावण महिन्याच्या अखेरीस तर हा उत्सव अधिकच पाहण्यासारखा असतो. कासच्या रूपाने महाराष्ट्राला हि एक फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा, सीतेची आसवे अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! गाडी पार्क करून कासच्या पठारावर आपण फुलांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी निघायचे.
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. याच पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणीपुरवठा करतो.कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत त्याचा समावेश केला. कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. याच गावालगत समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवरील कास पठाराचे एक हजार ९७२ हेक्टर राखीव वनक्षेत्र म्हणून वनखात्याने जाहीर केले आहे. हे पठार सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर सुद्धा आहे.कास पठार हे UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचे दोन प्रकार आहेत १) सांस्कृतिक वारसा स्थळे २) नैसर्गिक वारसा स्थळे. साल २०१२ ला भारताच्या पश्चिम घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला त्यात ३९ जागांचे संवर्धन गरजेचे ठरले त्यातली एक महत्वपूर्ण जागा आहे “कास पठार”. ह्या पठारावर ८५० प्रकारची विविध फुले फुलतात. International Union for Conservation of Nature and Natural Resources ( IUCN ) हि संस्था जगातील विविध पशु तसेच वनस्पती ह्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करून ज्या प्रजातींचा ऱ्हास होतो आहे त्याची एक रेड लिस्ट प्रकाशित करते, त्या प्रजातींचे संवर्धन अत्यंत गरजेचे असते अश्या ह्या रेड लिस्ट मधील साधारण ३९ फुले हि कास पठारावर अस्तित्त्वात आहेत. ही माहिती देण्याचे कारण की कास पठार बघतांना आपल्याला किती जबाबदारीने ह्या फुलांचं आनंद घ्यायचा आहे हे समजू शकेल. ह्या वेगाने ऱ्हास होणाऱ्या प्रजातींना आपल्याकडून नुकसान होणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून कास पठार फिरायला हवे. Aponogeton satarensis (वायातुरा) नावाची अति दुर्मिळ वनस्पती कासला आढळते ती बघायला मिळाण नशिबाचा भाग आहे. ही वनस्पती केवळ साताऱ्यात आढळते म्हणूनच तिच्या नावात हि satarensis असा उल्लेख दिसतो वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कासवरील फुलांचे अस्तित्व धोक्यात येउ लागले होते. त्यामुळे वनविभागाने पठारावर दुतर्फा जाळी लावून त्यांना सरंक्षित केले आहे रानफुले पाहण्यासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांच्या सोयीसाठी कास पठारावर आता पर्यटकांसाठी जांभ्या दगडात पायवाटा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळचं रूप प्राप्त झालं आहे. निळ्या ,गुलाबी,जांभळ्या,पांढऱ्या ,पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुलांची उधळण पाहण्यात एक वेगळीच मजा येते. काही विरळ तर काही ठिकाणी गर्द असे गुलाबी फुलांचे गालिचे पहावयास मिळतात. ढगाळ वातावरणातून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आल्हाददायक वाटते. फोटोग्राफर्स साठी मनसोक्त फोटो काढायचे हक्काचं ठिकाण तर कासच. त्यात आजकाल प्री -वेडिंग चे फॅड असल्याने निसर्गप्रेमींपेक्षा जास्त गर्दी त्यांचीच दिसते. कास पठारावर काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंतच म्हणावा लागेल. कास पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव फार कमी प्रमाणात आहे. हे पठार अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. पण त्याच बरोबर येथील वातावरण शेकडो रानफुलांना पोषक असं आहे आणि ह्या अग्निजन्य खडकावरही जणू स्वर्ग अवतरतो. पूर्वी कास पठारावर मुक्त भटकंती शक्य होती पण पर्यटकांनी भरभरून नुकसान करायला सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या, कचरा वाढू लागला. प्रेयसीचे फोटो फुलात बसून काढणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसी / बायको पेक्षा ही रानफुलं नाजूक आहेत हे कदाचित समजलं नाही. मुलांना बगीचात खेळायला आणल्यासारखे फुलात बागडायला सोडणारे पालक ही दिसू लागले. फोटोग्राफी करण्याच्या नादात फुलांच्या बहरात कॅमेरा घुसावणारे फोटोग्राफर दिसू लागले. आणि मग नाईलाजाने सरकारला कास पठारला कंपाउंड घालावं लागलं आता निर्धारित रस्त्यावरून चालत पठार बघावं लागतं तरी हि ह्या कंपाउंड मधूनही फुलात शिरणारे वीर ह्या देशात दिसतात. आपण जेव्हा कास ला भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्याल ह्याची खात्री आहे
सध्या कास ला पार्किंग शुल्क आणि प्रवेश शुल्क आकारले जाते. कधी कधी कॅमेरासाठी सुद्धा शुल्क आकारतात ह्या पैश्यातून पठार संवर्धनासाठी कामे तसेच जवळच्या गावांत काही कामे केली जातात. सातारा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि तुम्ही कास च्या जोडीला जवळची अनेक पर्यटन स्थळे करू शकता. चार पूर्ण दिवस सातारा परिसराची पिकनिक ठरवू शकता
कास पठार म्हणजे निसर्ग मित्रांचे नंदनवन, ऑगस्ट , सप्टेंबर महिन्यात फुलणारे फुलांचे गालिचे, विविध रंगाची, आकाराची फुलं म्हणजे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचा जणू कुंभमेळा. नजरेचं पारण फिटणे ह्या म्हणीचा आशय खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर कास पठारावर ह्या काळात एकदा नक्की जावे.
गर्दी टाळायची असेल आणि सुट्टी हातात असेल तर आठवड्याच्या मधल्या दिवसात कासला जावे कारण शनिवार रविवार तिथे जणू जत्रा भरते. कार पार्किंग इतक्या दूर करावी लागेल की फुलांपर्यंत पोचताच दामायला होईल. पण कास खरोखर बघायचं असेल तर भरपूर भटकायची तयारी करून जाणं गरजेच आहे. साताऱ्यात राहण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, तसेच MTDC मान्यताप्राप्त राहण्याच्या व्यवस्था कास पठारा पासून जवळ उपलब्ध आहेत. “कास पुष्प यात्री निवास” त्यासाठी संपर्क : श्री विठठल किरदात , भ्रमणध्वनी - 8291008666, 9594934666, 8080077606, 9420488392 कासचे पठार हा निर्सगाचा चमत्कार वर्षातून काही दिवसच फुलणारी ही फुले पाहण्याचा मोह कुणालाही आवारणार नाही हे नक्की. फेसबुक, विविध टिव्ही चॅनल्सवरती कासचे दर्शन लोकांना घडू लागले. नेहमीची लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणांना आता पर्यटक कंटाळू लागले आहेत. तेव्हा काही तरी नवीन ठिकाणी एनजॉयमेंट करण्यासाठी कासकडे लोकांनी मोर्चा नेलेला आहे. मी त्यातलाच एक. हा एक पर्यटनाचा भाग होऊ शकतो. असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, खरोखरच येथे जाणे प्रत्येकाला गरजेचे आहे काय? अभ्यासकांनीच येथील पुष्पांचा अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. शक्यतो अभ्यासकांनीच येथे जाणे गजरेचे आहे. ‘वर्ल्ड हेरिटेज'च्या यादीत ‘पठारा'चा समावेश झाल्याने हंगामात पर्यटकांचा आकडा लाखांपर्यंत पोचतो आहे. पठाराला प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच पर्यटकांचा ओढा इकडे जास्त वाढत असल्याच्या बातम्या ही पेपरात वाचायला मिळतात. वनविभागाने पर्यावरण संरक्षणासाठी येथे संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. पर्यटनकर लावण्यात आला आहे. मोठी बस १५०, कार ४० रुपये, प्रति माणसी १०, ट्यू व्हिलर १० रुपये, फोटो ग्राफीसाठी व्यावसायिक छायाचित्रकारांना १०० रुपये, पर्यटक कॅमेरे ५० रुपये असा कर बसविला आहे. येथील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीही अनेक ठिकाणी होते. पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून आल्याने वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजनही यामुळे नक्कीच ढासळते. पोलिसांना गर्दी आवरत येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे. एवढे करून देखील फुले पाहण्यासाठी अनुकूल वातावरण असले तर ठिक नाहीतर धो-धो पावसात फुले काय दिसणार. हा अनुभव ज्यांना घ्यायचा असले त्यांनी आवर्जुन कासाला जावे अन्यथा ‘दूरून डोंगर साजरे’ या प्रमाणे लांबूनच दर्शन बरे. कास पठारावर रहाण्यासाठी काही संपर्कक्रमांक :- १) कास व्हिलेज रिसॉर्ट : 8291008666, २) हेरीटेज वाडी
३) कासाई रिसॉर्ट
४) हॉटेल सह्याद्री पुष्प
*हॉटेल कास बामनोली ऍग्रो टुरिझम*
*राहण्याची व जेवणाची उत्तम सोय.
*स्वच्छ आणि सुंदर परिसर
*गावरान पद्धतीचे रूजकर जेवण
*रूम उपलब्ध
*पार्किंग उपलब्ध
*बोटिंग सेवा उपलब्ध
सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे आपले हॉटेल कास बामनोली ऍग्रो टुरिझम.
उपाययोजना : कास पठाराच्या सुरूवातीलाच पर्यटकांकडून वसुली करावी. यासाठी ठिकठिकाणी वसुली बुथ उभे करून वेळ वाचवता येईल. अवजड मोठ्या वाहनांना येथे जाण्यास बंदी करावी. यासाठी वनविभागाकडून स्वतंत्र्य वाहतूक योजना राबविल्यास ट्रॅफिक जॅमसारखे प्रश्न सुटून सर्वांनाच आनंद घेता येईल. फुले तोडणाºयांवर दंड आकारावा. येथे जाण्यासाठी आॅनलाईन सुविधेद्वारे नावनोंदणी करावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. हंगामात शनिवार व रविवारी २००० गाड्यांपेक्षा जास्त वाहनांना परवानगी देऊ नये. येथे जाणे खरोखरच गरजेचे आहे काय? याचा विचार प्रत्येकाने करावा. कास मध्ये मिळालेले काही फुलांचे फोटो इथे टाकतो आहे.
Lambert's Borage - हिरवी निसुर्डी
Vigna vexillata - हळुंदा, रानघेवडा
Neanotis lancifolia - तारागुच्छा
Impatiens oppositifolia - तेरडा
Curcuma caulina - चवर
Habenaria foliosa - उग्र हबेअमरी
Water Willow - करंबल
Nimphoides Indicum- कुमुदिनी
Pogostemon deccanensis - जांभळी मंजिरी
Solanum xanthocarpum - काटे रिंगणी
Strobilanthes callosus - कारवी
Konkan Pinda - पंद, पेंद
Cyanotis Cristata - नभाळी
सोनकी - Graham's groundsel
कासपठारावर आढळलेल्या काही फुलांची जुजबी माहिती खाली देत आहे. 11. Common name:- Marsh DewFlower मराठी नाव:- अबोलीमा Botonical Name:- Murdannia lanuginose प्रजाती:- डे फ्लॉवर फॅमिली हंगाम:- ऑक्टोबर ते नोव्हेंबर आढळण्याची ठिकाणं :- भारत द्विलकल्प (Peninsular India) 22. Common name:- Hairy Smithia or Micky mouse मराठी नाव:- कावला Botonical Name:- Smithia hirsuta प्रजाती:- Pea family हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर 3.Common name:- Large Dewflower मराठी नाव:- नीलिमा Botonical Name:- Murdannia simplex प्रजाती:- डे फ्लॉवर फॅमिली हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर
दीपकाडी - Dipcadi montanum
4. Common name:- Rock Dipcadi मराठी नाव:- दिपकाडी Botonical Name:- Dipcadi saxorum प्रजाती:- Asparagus family हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर आढळण्याची ठिकाणं :- बोरिवली मधील कान्हेरी च्या परिसरात मुख्यत्वे आढळतात 5. Common name:- Grass leaved मराठी नाव:- खुरपापणी किंवा सीतेची आसवे Botonical Name:- Utricularia graminifolia प्रजाती:- Bladderwort family हंगाम:- सप्टेंबर ते नोव्हेंबर
आढळण्याची ठिकाणं :- सह्याद्री- पश्चिम घाट
कास तलाव :- साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात अनेक नैसर्गिक झरे असल्यामुळे बारामाही पाणी असते. या तलावातून सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या पठारावर जांभूळ, करवंदे, फणस, आंबा, हिरडा व अनेक दुर्मिळ औषधी झाडे अस्तित्वात आहेत. कासपासून फक्त १२ कि.मी. अंतरावर बामणोली हे निसर्गप्रेमिचे आवडते ठिकाण आहे. नौकाविहार करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. कासकडे जाताना सज्जनगड, उरमोडी नदीचा प्रवाह आणि त्याचे अडवलेले पाणी, (उरमोडी प्रकल्प) यांचे दृश्य केवळ अप्रतिम! कास तलाव इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला असून तलावाजवळ कास गाव आहे. भरपूर मोठया असलेल्या या तलावाच्या आजूबाजूला चांगली झाडी आहे. कोतवाल, दयाळ, बुलबुल, रॉबिन असे अनेक पक्षी, कधीतरी उंच झाडाच्या शेंडयावर पंख वाळवत बसलेला पाणकावळा दिसतो. अचानक कधीतरी जोरात सूर मारून चोचीत मासा पकडून पुन्हा झाडावर बसतो. ही कृती तासन् तास पाहायला मनाला अतिव समाधान लाभतं. तलावाच्या बाजूनेच रस्ता येत असल्याने एखाद्या शांत जागेवर वहान थांबवून ओलंकंच्च वातावरण अनुभवावं, बरोबरच्या चहा-फराळाचा यथेच्छ समाचार घ्यावा, बाजूच्या झाडीतली रंगीबेरंगी फुलपाखरं पहावीत… पर्यटन ह्याला म्हणतात.उन्हाळयात मात्र तलावाच्या आजूबालूला रखरखीत जमीन, पाणी कमी झालेलं असा काहीसा नजारा पाहायला मिळतो.
वजराई धबधबा -
वजराई धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला सातारा जिल्ह्यातील भांबवली गावाचा रस्ता पकडावा लागतो. साताऱ्यापासून हे २७ km आहे. तर प्रसिद्ध कास पठारापासून साधारण ३ km वर आहे . भांबवली हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पंधरा ते वीस उंबरठा असलेलं हे छोटंसं टुमदार गाव . गावाच्या सुरुवातीलाच ग्रामदैवत श्री जानाई देवीच छोट पण मनाला भुरळ घालणारं मंदिर आहे . गावकऱयांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून गावापर्यंतचा रस्ता, पाणी , लाईट यांची सोय करून घेतली आहे . त्यामुळे पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने या ठिकाणी येता येते .
भांबवलीच्या जंगलात बरेच वन्यजीव आहेत, मुख्यत्वे करून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर, इ. आणि क्वचित वाघ, अस्वलेदेखील दिसतात असे बोलतात. अनेक प्रकारचे पक्षी, मुख्यत्वे करून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची औषधी झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल (डायबिटीससाठी) आणि इतर वनौषधी झाडेझुडपे आढळतात. गावापासून धबधबा कडे जाण्यासाठी मळलेली पायवाट आहे . हिरवीगार गच्च झाडी त्यामधून जाणारी ही लाल पायवाट मनाला भुरळ घालते पावसाने वाटेत बऱ्याच दगडांवर मखमली शेवाळाचा मुलामा चढवला होता ,त्याच्यावर छोट्या नाजूक रंगीत फुलांची कलाकुसर करून निसर्गाने आपली अप्रतिम कलाकृती साकारली होती. त्याच्यावरून नजर हटत नव्हती .ही पायवाट साधारण २ ते २.५ कि.मि . आहे मध्येच काही अंतरावरून या धबधब्याचे पूर्ण दर्शन होते पण धबधब्यापर्यंत जायचे असल्यास आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात वाट बिकट आणि रिस्की आहे पण धबधब्यांचं विराट रूप पाहिलं की घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याच जाणवत. दाट जंगलातून वाट काढत एका निमुळत्या उतारावर आपण जाऊन पोहोचतो आणि समोर जे काही दृश्य दिसते ते खरंच अवर्णनीय असते.केलेल्या पायपिटीचं सार्थक झालं होतं. एवढा मोठा तीन टप्प्यांमध्ये कोसळणारा धबधबा थक्क होउन पहात रहातो. असं वाटतं होतं कि, पांढऱ्याशुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याने हिरवी शाल पांघरली आहे आणि वरती त्याने ढगांचा मुकुट चढवला आहे. वजराई धबधब्याची उंची हि तब्बल ५६० मी. (१८४० फूट) इतकी आहे. तो तीन टप्प्यांत कोसळतो आणि हा मेघालयातील नोहाकालीकाई नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उंचीवरून कोसळणारा धबधबा मानला जातो. या धबधब्यापर्यंत गाडीने जाता येत नाही. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे.नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असं हे सुंदर, मनमोहक ठिकाण.भांबवली वजराई धबधबा बघितला कि स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे छोटे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. भांबवली वजराई धबधबा पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी. भांबवली वजराई धबधबा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो हे मात्र नक्की. बामणोलीवरून पुढे कोयना धरणाच्या जलाशयाला भेट देण्यासाठी जाता येते. कोयना धरणातील तीन नद्यांचा संगम जिते होतो, त्या ठिकाणी बोटीने जाता येते. त्यानंतर विनायकनगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मठाला भेट देऊ शकता. येथील मंदिरात गणपतीची सुबक व कोरीव मूर्ती आहे. तिथेच जवळ शिवाजी महाराजांचे स्मारक आणि अष्टकोनी मठ आहे. तिथे शासनाने बोटीसाठी धक्का बांधला आहे. या ठिकाणी असलेले शांत वातावरण मनाला खूप भावते. संपूर्ण जंगलाचा परिसर, तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन असा निसर्गसौंदर्याचा उत्तम नमुना अनुभवता येतो. हा धबधबा उरमोडी नदीच्या स्रोतातून येतो . वर्षांचे बाराही महिने तो दर्शन देतो .तो तीन टप्प्यांमध्ये पडतो . त्यांची साधारण उंची ८५३ फुूूटआहे . पाणी जिथून पडते त्या ठिकाणापासून शेवटच्या टप्प्याची उंची मात्र ५६० मि.आहे या मोजमापाने तो भारतातील दुसऱ्या नंबरचा उंच धबधबा आहे . या तीन टप्प्यांची एक आख्यायिका आहे महाराष्ट्राचे दैवत संत रामदास स्वामींनी हा पहाड आपल्या तीन पावलांमध्ये पार केला त्या तिन्ही पावलांचे हे तीन टप्पे .त्यामुळे सरळ वाहणारा हा धबधबा या तीन टप्प्यात वाहतो. पावसाळ्यात हा धबधबाआपले रौद्र रुप दाखवतो. गावकऱ्यांच्या माहितीनुसार कास पठारा सारखीच फूल भांबवली पठारावर पण फुलतात . गणेश चतुर्थीला गावचे लोक धबधब्याच्या पायथ्याला वजराई देवीला नैवेद्य दाखवतात तर दर वर्षी १ मे ला गावची जत्रा भरते. ग्रामदेवता श्री जानाई देवीचे मंदिरांबरोबरच येथे श्री वाघ्रेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे . तेथे नवरात्रीत वाघ देवीचे दर्शन घ्यायला येतो असे बोलतात .वजराई धबधब्याच्या ठिकाणी माथ्यावर वजराई देवीचे जागृत स्थान आहे . गावातील लोकांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती , पशुपालन, कुक्कुट पालन आहे या सोबत सध्या येणाऱ्या पर्यटकांची चहा पाण्याची ,जेवणाची , रहाण्याची सोय करून आदरातिथ्य व उत्पन्न या दोन्हींची सांगड घालतात.
भांबवली वजराई धबधब्याला पर्यटन स्थळ घोषित केले असून या पर्यटन स्थळाला “क” दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून नावारूपाला आलेल्या आणि तब्बल १८४० फुट उंचीवरून तीन टप्प्यात कोसळणारा भांबवलीचा वजराई धबधबा गेल्या काही वर्षांपासून प्रकाशझोत आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पुरेशा दळवळणाच्या सुविधांअभावी दुर्लक्षित राहिलेला आणि घनदाट चोहीकडून गर्द जंगलाने व्यापलेला भांबलीचा वजराई धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू लागला आहे. परंतु या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा घनदाट जंगल व्याप्त आणि घसरड्या पायवाटामधून जातो.त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग अतिशय धोकादायक होता. वजराई धबधब्याला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे वनविभागाच्या पुढाकाराने या धबधब्याच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वजराई धबधब्यावर पर्यटन विकासाच्या दृष्टीने सोयीसुविधांचे काम सुरू आहे. भांबवलीच्या वजराई धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्गावरील जंगलव्याप्त आणि घसरड्या उताराच्या ठिकाणी पायरी मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जवळपास एक किलोमीटरचा पायरी मार्ग आणि रेलिंगचे काम यातुन केले जाणार असुन यातील बहुतांश काम पुर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. यंदाच्या पर्यटनाच्या हंगामात या ठिकाणी स्वच्छतागृह, तिकीट केबिन, परिसराची माहितीचे दिशादर्शक आणि सुचना फलक, प्रथमोपचार किट, अत्यावश्यक फोन नंबर्सची लिस्ट, विविध दुर्मिळ जातींच्या झाडांच्या माहिती फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच वॉच टॉवर ठोसेघर धबधब्याप्रमाणे प्रेक्षक गॅलरी ही कामे मंजूर असून पुढील हंगामा पर्यंत पुर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, वनविभागाच्या माध्यमातून भांबवलीच्या वजराई धबधबा या पर्यटन स्थळाचा कायापालट केला जात आहे. यंदाच्या हंगामात स्थानिक वन समिती आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रवेश शुल्क दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदापासून पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभागाचे अधिकारी आणि वन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कास पुष्प पठार, ठोसेघर धबधबा, कास तलाव यांच्या पाठोपाठ वजराई धबधबा यामुळे पर्यटनाला बहर येणार आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नामुळे पर्यटकांना दुर्गम डोंगराळ भागातुन सुरक्षित धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी पाय-या आणि रेलिंगची सोय केली आहे. पावसाळ्यानंतर लहान मुलांनसाठी विशेष आकर्षण म्हणुन “म्हातारीचा बुट” बनविण्यात येणार आहे. पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकीटे अस्ताव्यस्त फेकुन कचरा करू नये. तसेच वन्य प्राणी, जीव जंतू, झाडे यांची हानी करू नये. संयुक्त वनव्यवस्थापन समिती वनविभागाच्या मदतीने आवशक सोयी सुविधा पुरवणार आहे. या स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी काही सूचना :- १) अति पावसाचे दिवस सोडून हा धबधबा पाहण्यासाठी जाणे. श्रावण महिन्यात आपण जायचा बेत केला तर आपल्याला कास पठार-कास तलाव व वजराईआणि बामनोली ही ठिकाणे एका दिवसात करता येतात. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये सुद्धा येथील वातावरण आल्हाददायक असते . २) ट्रेकिंगचे शूज आवश्यक ,तर फुल बाह्यांचा शर्ट व ट्रॅक पॅन्ट असावी . ३) फोटो काढण्यासाठी कॅमेरा किंवा मोबाइल घेऊन जाणे बाकी जादाच सामान आपण आपल्या वाहनात किंवा गावकऱ्यांच्या घरी ठेवावे .पक्षी निरीक्षकांना विविध प्रकारचे पक्षी येथे भेटतात .तर कधी गवे सुद्धा दर्शन देतात . ४) सर्वात महत्त्वाची सूचना सोबत नेलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू पाण्याच्या बाटल्या व वेस्टन तिथे न टाकता आपल्याबरोबर घेऊन येणे . कारण हा सुंदर वारसा आपल्याला जतन करून आपल्या पुढच्या पिढीला सोपवायचा आहे.
दत्तवाडी,केळवली धबधबा :-
कास पठार जवळपास १२५० मीटर उंच आहे.या पठाराला सगळ्या बाजूने ताशीव कडे असल्यामुळे सहाजिकच पठारावर पावसाळ्यात जे ओढे तयार होतात्,ते आपल्या जलौघाचा संचय या कडयावरुन लोटून देतात.यातून फेनधवल पाण्याचे डोळ्याला सुखावणारे आणि तुषारस्नान घडविणारे धबधबे निर्माण होतात.अस्ताव्यस्त पसरलेल्या कास पठारावर भांबवली,कासाणी,एकीव, सांडवली असे अनेक धबधबे या परिसरात आहेत.यापैकी एक अत्यंत अनवट आणि प्रसिध्दीपासून दुर असलेला धबधबा म्हणजे "दत्तवाडी,केळवली धबधबा'.
दत्तवाडी केळवलीला जायला तसे तीन चार मार्ग आहेत,पण कासमार्गे जाणे अधिक सोयीचे आहे.सातार्यापासून २२ कि.मी.वर कास तलाव येतो.तो ओलांडला कि कास गाव येते.त्यानंतर डाव्या हाताला धावली ७ कि.मी.अशी पाटी दिसते.या रस्त्याने पुढे जावे.अतिशय सुनसान आणि गर्द झाडीने झाकलेल्या या रस्त्यावर शांतता अनुभवायला मिळते.पावसाळ्यात आजुबाजुच्या ओढ्याचे पाणी,पक्षांचा मंजुळ आवाज एकत वाटचाल सुरु ठेवायची.कास गाव ओलांडल्यावर सात कि.मी.वर जुंगटी हे गाव आहे. या गावातूनच दत्तवाडीकडे जाणारी वाट आहे.गावाच्या दक्षिण टोकाला असणार्या शेतातून पुर्वेकडे वाट जाते,हिच वाट आपली.दाट जंगलातून साधारण तीन तासाच्या पायपिटीनंतर हि वाट आपल्याला दत्तवाडी धबधब्यापाशी घेउन जाते.या दाट झाडीच्या वाटेवर शतावरीची झुडुप मोठ्या संख्येने पहायला मिळतात.अतिशय निसर्गसंपन्न अशी हि वाटचाल आहे. एन पावसाळ्यात आपण या तांबड्या मातीच्या वाटेने जात असु तर बर्याचदा हि वाट ढगात हरवली असते. बेभान वहाणारा वारा,वाटेवरुन वहाणारे पाण्याचे प्रवाह, आजुबाजुला दाट वनराई याचा आनंद घेत आपण अचानक केव्हा आडवे होतो याचा नेम नसतो.अर्थात पुर्ण वाटचालीत प्रत्येकजण एकदा का होईना धराशायी होतोच.
या वाटचालीत उजव्या हाताला सडा म्हणजे मोठे प्रचंड पठार जुंगटी गावापासून सतत आपली सोबत करीत असते. या पठारावरुन ढग घासून पुढे जात असतात.मध्येच उजव्या बाजुच्या उतारावर जळिकवाडी नावाचे गाव लागते.या गावाकडे जाताना नजर डावीकडे गेली तर पुर्ण कास तलावाचा परिसर नजरेस पडतो.तसेच भांबवली धबधब्याचे सर्व टप्पे येथून दिसतात. जळिकवाडीच्या वरच्या अंगाने आपली वाट म्हणजे खडकाळ रस्ता आहे.पुढे गेले कि एक मोठे मैदान दिसते.इथे वनखात्याने वृक्षलागवड केली आहे.हे मैदान पार केले कि वाट पुन्हा दाट झाडीत शिरते.
या वाटेने शांतपणे चालल्यास आणि नशीब जोरावर असेल तर एखाद्या वन्य प्राण्याचे दर्शन होउ शकते.साधारण अर्धा-पाउण तास चालल्यावर एक गाडीवाट आपल्याला आडवी येते.उजवीकडे जाणारी वाट दत्तवाडी गावाकडे जाते.तर सरळ जाणारी वाट केळवली गावात जाते.जुंगटीपासून सतत उजव्या हाताला सोबत करणारा सडा या ठिकाणी संपतो. त्याला वळसा घालून दत्तवाडीला जाता येते.या सड्याकडे नीट पाहील्यास अनेक नैसर्गिक गुहा दिसतात.या गुहेत अस्वलांची वस्ती आहे असे स्थानिक लोक सांगतात.
या वाटेने पुढे जात असतानाच जंगलातील दाट झाडीत एक छोटा धबधबा दिसतो.इथे थोडी फोटोग्राफी करुन तासाभराची वाटचाल केली कि कौलारु घरांची अवघ्या तीस-चाळीस उंबर्यांची दत्तवाडी नजरेस पडते.गावाबाहेर गुरे वळणारा एखादा गुराखी नजरेला पडतो.त्याला विचारुन गावची वाट पकडायची.गावात दत्ताचे प्रशस्त मंदिर आहे.गावातील एखाद्याला वाटाड्या म्हणून घेउन गावाबाहेर भाताच्या खाचरावरुन जाणार्या पाउलवाटेने थोडा तीव्र उतार उतरला कि उजव्या हाताला कड्यावरुन अंग लोटून देणारा धबधबा नजरेला पडतो.हाच तो दत्तवाडी धबधबा.खालच्या बाजुला केळवली गाव असल्याने याला केळवली धबधबा असेही म्हणतात.या धबध्ब्याचे पाणी पुढे सांडवली धबधब्याच्या प्रवाहाला मिळते आणि यातून उरमोडी धरणाचा जलाशय तयार होतो.
गवताने झाकलेल्या वाटेने आणखी थोडे पुढे गेले कि धबधबा जिथे पडतो तिथे आपल्याला जाता येते.वर्षानुवर्षे पाणी पडल्याने धबधब्याच्या थेट खाली खोल डोह तयार झाला आहे,पाण्याचा प्रवाह तसाच वहात पुन्हा एका कड्यावरुन उडी घेउन छोटा धबधबा तयार होतो.मात्र या कड्याला पुढे तीव्र उतार आहे,त्यामुळे पुढे न जाणे योग्य. परतीसाठी पुन्हा तीच वाट घेण्यापेक्षा केळवली मार्गे आल्यास केळवली परिसरातील कड्यावरचे धबधबे पहाता येतात.
केळवली गावातून बाहेर पडून पुन्हा आलेल्या वाटेने परत येता येते किंवा नित्रळमार्गेही परत येता येईल.हा धबधबा बारमाही असला तरी त्याचे सौंदर्य हे जुन्,जुलै,ऑगस्ट्,सप्टेंबर या महिन्यात पहायला मिळते.हा धबधबा बघायचा तर शक्यतो खाजगी वहान सोयीचे.आपल्या वहानाने आपण थेट जुंगटीपर्यंत येउ शकतो.सातारा-जुंगटी हे अंतर साधारण तीस कि.मी.आहे.
बामणोली :-
सातारा येथून बामणोली अंदाजे 40 किलोमीटर अंतर आहे. पावसाळ्यात मधे थांबत थांबत कास तलावाच्या दिशेने जाता येते. साता-याच्या दक्षिणेला सज्जनगड दिसतो. तिथून पुढे दहा कि. मी. अंतरावर कन्हेर व उमरेडी ही दोन धरणे दिसतात. काही अंतर पुढे जाताच कास तलाव दिसतो. ऐन पावसाळ्यात हा कास तलाव आणखीनच सुंदर दिसतो.
Bamnoli Boat club
निसर्गाची देणगी लाभलेला हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या कास तलावाचे वैशिष्ट्य असे, की त्याचे पाणी उन्हाळ्यातही कमी होत नाही. कास तलावानंतर बामणोली जाता येते. डोंगरातील वळणावळणाचा रस्ता आणि पावसामुळे तयार झालेले लहान मोठे धबधबे यांच्यामुळे वातावरण सुखावह झाले असते.
बामणोलीवरून पुढे कोयना धरणाच्या जलाशयाला भेट देण्यासाठी जाता येते. कोयना धरणातील तीन नद्यांचा संगम जेथे होतो, त्या ठिकाणी बोटीने जाता येते. त्यानंतर विनायकनगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मठाला भेट देऊ शकता. येथील मंदिरात गणपतीची सुबक व कोरीव मूर्ती आहे. तिथेच जवळ शिवाजी महाराजांचे स्मारक आणि अष्टकोनी मठ आहे.
Bamnoli boat club price chart
Places to be visited from Bamnoli village
तिथे शासनाने बोटीसाठी धक्का बांधला आहे. या ठिकाणी असलेले शांत वातावरण मनाला खूप भावते. संपूर्ण जंगलाचा परिसर, तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन असा निसर्गसौंदर्याचा उत्तम नमुना अनुभवता येतो
सज्जनगडच्या परिसरात
सृष्टिमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक। असे लिहीणार्या समर्थांचा सज्जनगड सगळ्यांनाच चिरपरीचीत आहे. समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आणि पावसाळ्यातील उधाणलेला निसर्ग पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक सज्जनगडाला गर्दी करतात. पुर्वी परळीच्या वाटेने पायर्या चढण्याचे दिव्य आता करावे लागत नाही. निम्या उंचीपर्यंत गाडी जाते. थोडक्या पायर्या चढून आपण गडमाथ्यावर पोहचतो. हल्लीच प्रसिध्दीस आलेले कास पठार आणि ठोसेघरचा धबधबा जवळच असल्याने एका दिवसात कास, ठोसेघर आणि सज्जनगड अशी घड्याळाची शर्यत करीत पाहिले जातात. पण एक दिवस जादाचा काढून सज्जनगड मुक्काम केला तर आजुबाजुला बरेच काही आहे. त्याचाही आनंद घेता येईल. तसेही सज्जनगडावर मुक्कामाची सोय असल्याने, थोड्या नियोजनाने ठोसेघरचा धबधबा, नव्याने झालेली समर्थ सॄष्टी, परळीचे प्राचीन शिवमंदिर, अजुन फारसा प्रसिध्द्द न झालेला चार टप्प्यात पडणारा सांडवली धबधबा आणि सर्वसामान्य पर्यटकांपासून दुर असणारी आणि साहसी तरूणाना साद घालणारी मोरघळ अश्या बर्याच गोष्टी पहाता येतील,
सज्जनगड परिसराचा नकाशा
समर्थ सृष्टी सर्वप्रथम पाहुया"समर्थ सृष्टी". सातार्याकडून सज्जनगडकडे जाताना गजवडी गावाजवळ सज्जनगड दिसु लागतो. गजवडीमधुन घाट चढुन आपण सज्जन्गडकडे जाताना उजव्या हाताला "ज्ञानश्री ईन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी" या नव्याने झालेल्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातच हि समर्थ सृष्टी उभारलेली आहे. समर्थ वाड:मयाचे अभ्यासक अरुण गोड्बोले याांची हि संकल्पना. समर्थांच्या आयुष्यातील दहा-पंधरा महत्त्वाचे प्रसंग निवडून ते साकार करणारा सहा हजार चौरस फूटांचा एक हॉल, समर्थस्थापित अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचा तीन हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल व लघुपट दाखवण्यासाठी दीडशे सीट्सचे मिनी थिएटर असे ‘थीम पार्क’चे स्वरूप आहे. त्याला जोडून बुक स्टॉल, उपहारगृह व चार-पाच दुकाने आणि प्रसाधनगृहे ही सारी योजना आहेच. बाबासाहेब पुरंदरे, मारूतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन तज्ज्ञ राजीव जालनापूरकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याचे एकूण बजेट दीड कोटींवर गेले. भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी व पुण्याच्या ‘गार्डियन ग्रूप’चे सर्वेसर्वा मनीष साबडे या दोघांनी त्यासाठी आनंदाने सहकार्य देऊ केले आणि ‘समर्थ दर्शन टुरिझम व्हेंचर’ या नावाने प्रकल्पाची उभारणी केली गेली. ऐतिहासिक भासावे म्हणून सर्व बांधकाम जांभा दगडात केले आहे. तो कोकणातून आणण्यात आला. कोल्हापुरच्या विजय डाकवे यांनी सिव्हिल वर्क केले. कलादिग्दर्शक अभय एकवडेकर यांनी समर्थ जीवनातील प्रसंगांच्या उभारणीची धुरा सांभाळली. त्यासाठी फायबरचे पुतळे, अन्य साहित्य यांचे काम सुरू झाले. कट-आऊटसाठी वेशभूषा करून, कलाकार निवडून फोटोग्राफी करण्यात आली. अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचे काम बंगाली कलाकार चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लायटिंगची जबाबदारी राहुल दीक्षितने तर फोटोग्राफी विजयेंद्र पाटील यांनी सांभाळली. पाटील यांनीच समर्थांच्या तीर्थस्थानांच्या लघुपटाचे शुटिंग जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड येथे जाऊन केले.समर्थांचे घर, जन्म, बालपण, उपासना, विवाहमंडपातून पलायन, टाकळीतील वास्तव्य - तेथील तपस्या, गोमय मारुतीची स्थापना, मोगली अत्याचार, बद्रिनाथला हनुमंत स्थापना, महाराष्ट्रात आगमन, चाफळ, दासबोध लेखन व आनंद भुवन हे प्रसंग उत्कट रीत्या हुबेहूब साकार झाले आहेत. मारुती दर्शन हॉलमध्ये अकरा मारुतींच्या प्रतिकृती, त्याच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्याचा नकाशा व तेथील नवी मंदिरे असे दाखविले आहे. प्रत्येक मारुतीची माहिती देणारे फलकही आहेत. दीडशे क्षमतेचे चित्रपटगृह, प्रोजेक्टर, साऊंड व तेथे समर्थांवर डॉक्युमेंटरी दाखवीली जाते. भाई वांगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त उदकशांत करून प्रकल्प मार्च २०१२ मध्ये पूर्णत्वाला आला.प्रवेश शुल्क मोठ्या व्यक्तीस चाळीस व मुलास तीस रूपये असे आहे. ईथे प्रवेश करतानाच बजरंग बलीचा भव्य पुतळा आपले स्वागत करतो. अत्यल्प तिकीट काढून आपण आत प्रवेश करतो. डाव्या बाजुला संग्रहालयाची ईमारत आहे.
आत प्रवेश केल्यानंतर समर्थांचा जन्म , बालपण, विवाह वेदीवरुन पलायन, तपस्या हे जीवनातील महत्वाचे ट्प्पे मुर्तींच्या माध्यमातुन दाखविले आहेत.
या शिवाय समर्थ स्थापित अकरा मारुतींच्या मुर्तींचे दर्शन घडविणरे वेगळे दालन आहे. सुदैवाने ईथे फोटोग्राफीला बंदी नाही.समर्थांच्या जीवनावर एकूण पंधरा दालने आहेत. एका कुटीत समर्थांच्या हस्ताक्षरातील काही पत्रे आहेत, त्यात त्यांचे गद्य स्वरुपातील एकमेव पत्र आहे. या शिवाय समर्थांनी बालवयात टाकळी ईथे लिहीलेल्या वाल्मिकी रामायणातील काही कागद, त्यात रेखाटलेली चित्रे, समर्थांचे व कल्याणस्वामींचे अस्सल चित्र हे सर्व आपल्याला त्या काळात नेउन आणतात. हे सर्व मान जांभ्या दगडात केल्यामुळे एक वेगळे सौंदर्य आलेले आहे. उगाच जाउन मुर्तींच्या पाया पडण्यापेक्षा हे सर्व डोळसपणे पाहिले पाहिजे. हे प्रदर्शन पाहून आल्यानंतर डाव्या हाताला एक प्रेक्षागॄह आहे, जिथे समर्थांचा जीवनपट दाखविला जातो. ईथे छोटे उपहारगॄहही आहे जिथे चहा, नाष्ट्याची सोय होउ शकते. ठोसेघर धबधबा समर्थ सॄष्टी पाहिल्यानंतर पुढे सज्जनगडाकडे न वळता तसेच रस्त्याने गेल्यास बोरणे घाटातून आपण पोहचतो १० कि.मी. वरच्या ठोसेघर या गावी. ईथला तारळी नदीवरचा धबधबा अलिकडेच प्रसिध्दीला आला आहे. साधारण दिडशे मीटरवरुन कोसळणारा मुख्य धबधबा व त्याला साथ देणारे दोन उप धबधबे डोळ्याचे पारणे फेडतात.
जोराचा वारा असेल तर बाजुच्या धबधब्याचे पाणी जणु स्लो-मोशनमधे पडते आहे असे वाटते. पुर्वी ईथे फारश्या सोयी नव्हत्या. अलिकडे मात्र मोठ्या प्रमाणात हॉटेल झाली आहेत, त्यामुळे जेवणा खाण्याचा खास सातारी पाहुणचार होतो. हा धबधबा पाहणे पुर्वी थोडे अवघड होते, अलिकडे सिंमेटची गॅलरी बसविल्याने अगदी जवळून धबधब्याचा आनंद घेता येतो. वनखात्याने या परिसरात दिसणार्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रकाशचित्राचे एक कायमस्वरुपी संग्रहालय उभारले आहे. पावसाळ्यात हा धबधबा लांबुन बघणेच सुरक्षित असले तरी पाउस संपता संपता, ऑक्टोबरच्या काळात गेल्यास थेट पात्रात उतरून धबधबा खालून पहाता येतो, मात्र थेट धबधब्याच्या खाली मोठा डोह असल्याने स्थानिक व्यक्ती बरोबर असावी. मुख्य धबधब्याच्या मागे छोटा धबधबा आहे.इथे पर्यटक पुढे जाउ नये म्हणुन शासनाने रेलिंग लावलेले आहे. तरी सुध्दा पाण्यात उतरण्याचे वेडे धाडस काही महाभाग करतात. धारेत वाहून जाउन जीव गमावल्याच्या बर्याच घटना ईथे झाल्या आहेत, तरी लोक त्यापासून धडा घेत नाहीत हे दुर्दैव. शिवाय घाटात दारु पिउन धुडगुस घालण्याने सर्वसामान्य पर्यटकांना त्याचा त्रास होतो ते वेगळेच. आता सुट्टीच्या दिवशी येथे पोलिस बंदोबस्त असतो. बहुतेक जण ठोसेघर धबधबा पाहून परत फिरतात, मात्र आणखी थोडे अंतर पुढे गेल्यास आपण चाळकेवाडी पठारावर पोहचतो. असंख्य पवनचक्क्या ईथे उभारल्या आहेत. एन पावसाळ्यात गेल्यास ईतका जोराचा वारा असतो कि आपण चंद्रावर चालतोय कि काय असे वाटते. हाच रस्ता पुढे पाटणला गेलेला आहे. मात्र पावसाळ्यात हा परिसर धुक्यात वेढलेला असतो आणि रस्त्याना बरेच फाटे फुटलेले असल्याने शक्यतो माहितगार नसेल तर पुढे जाउ नये. ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार ) हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात या पठारावर आल्यास अनेक प्रकारचे साप, गळ्याला निळा पडदा असणारा सरडा असे अनेक वन्य जीव पहाण्यास मिळू शकतात.
काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय ठोसेघर सज्जनगड - ठोसेघर रोडवर बोरणे गावाजवळ तपोवन आश्रम , श्रीमती काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय १२ मे २०१९ पासून सुरु झाले आहे .या संग्रहालयात शिवकालीन , मुघल , राजपुत कालीन वस्तू , शस्त्र , भांडी , नाणी इत्यादीची उत्कृष्ट मांडणी करण्यात आली आहे
हे वस्तुसंग्रहालय गावंड कुटूंबियानी चालु केले आणि ते त्याची उत्तम देखरेख करतात. सातारा,सज्जनगड्,ठोसेघर सहलीत या वस्तुसंग्रहालयाला जरुर भेट द्यावी. केवळ वस्तुसंग्रहालय नसून ईथे ध्यानधारणा देखील करता येते. वेळ :- सकाळी १० : ०० ते ६ :०० प्रवेश शुल्क :- १०/- रु फक्त.
संपर्क :- 91 9969609828 02162 – 206576 / 207576
रामघळ हि भटकंती उरकून आता निघुया समर्थांनी जिथे तप केले होते त्या ठिकाणी, म्हणजे "रामघळी" कडे. मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी दोन छोटी धरणे पहायला मिळतात. वाटेत डाव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.
हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.
बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.
ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबलो. उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.
डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी. रामघळीच्या बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले. शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.
परळीचे शिवमंदिरे
सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन गाव आहे. या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी .
शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष मंदिर म्हणतात.
त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . याला केदारेश्वर मंदिर म्हणतात. सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे.
पैकी दक्षिणेकडचे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. आता याची खुप पडझड झाली आहे. कदाचित याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी.
मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे..
मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश.
शिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत . येथे ही अव्यक्त रूपातील आहे.
मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.
एका चौथर्यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. आम्ही गेलो होतो तो दिवस मंगळवार असल्याने कोणीतरी गजाननाला जास्वंदी वाहिली होती. महादेव म्हणले कि नंदी आलाच. समोर हि नंदीची सुंदर मुर्ती.
शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.
याच परिसरात अनेक समाध्या आहेत माझ्या मते त्या लिगायत समाजातील असाव्यात. शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे . या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही. एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या ' एकांतवास ' भोगत आहे. गावापासून दूरवर असणारे हे मंदिर सध्या रिकाम टेकडे, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे विश्रांतीस्थान बनले आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराला स्थानिकांनी लोखंडी फाटक बनवून काहीसा संरक्षणात्मक उपाय अवलंबिला असला तरी आजही भरदिवसा येथे स्मशान शांतता अनुभवता येते. परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सांडवली धबधबा हे मंदिर पाहून या परिसरातील शेवटच्या आकर्षणाकडे जाउया, "सांडवली धबधबा". ठोसेघर धबधबा खुप प्रसिध्द झाला असला तरी याच परिसरातील हा धबधबा मात्र फारसा कोणाला माहिती नव्हता. मात्र अलिकडेच तो हि प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. मात्र इथे जाणे काहीचे दुर्गम आहे. कुस, नित्रळ या गावांमार्गे आपण उरमोडी खोर्याच्या शेवट्च्या गावात पोहचतो, निगुडमाळ. इथे बस सेवा नाही. एस.टी. फक्त नित्रळपर्यंतच येते. त्यामुळे आपले वाहन असेल तर सोयीचे जाते. मात्र धबधबा गावातून दिसत नाही.
गावातुन पश्चिम दिशेला चालण्यास सुरवात केली आणि थोडे अंतर गेल्यानंतर चार टप्प्यात पडणारा हा धबधबा दिसायला लागतो. शेतातुन चालत अखेरीस आपण धबधब्यामुळे तयार झालेल्या ओढ्यात पोहचतो. हा ओढा म्हणजेच उरमोडी नदीचा प्रवाह आहे. पुढील वाटचाल या ओढ्यातुनच करायची असते.
कधी काठावरून तर कधी पात्रातुन वाटचाल करित आपण एका मोठ्या धबधब्यासमोर येतो. याच्याही वर अजुन एक धबधबा आहे. मात्र पावसाळ्यात वर चढणारी वाट घसरडी होते आणि वरचा धबधबा पाहता येत नाही. पण आपण जिथवर आलो तो ही प्रवास आनंद देउन जातो.
हा धबधबा सांडवली गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे याला सांडवली धबधबा म्हणत असले तरी सांडवली हे खुप दुर्गम गाव असल्याने तिथुन जाणे सोयीचे नाही. एकुणच धबधब्याचे स्वरुप पहाता सामान्य पर्यटकाना ईथे जाणे अडचणीचे वाटु शकेल, मात्र साहसी तरूणांना हा धबधबा नक्कीच साद घालतोय.
धावडशी :-
हे सातारा जिल्ह्यातील एक धार्मिक ठिकाण आहे. साताऱ्याच्या वायव्येला सुमारे १० किलोमीटरवरील मेरुलिंग डोंगरांच्या पायथ्याशी वनश्रीने नटलेले हे एक खेडेगाव आहे. येथे ब्रह्मेंद्रस्वामी उर्फ भार्गवराम यांची समाधी आणि मठ आहे. श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांचा जन्म सन १६४९मध्ये विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडी येथे झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्र सरस्वती नायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामी वाई तालुक्यातील वीरमाडे येथे समाधिस्त झाले होते; (पुण्याहून येताना आनेवाडी टोल नाक्याच्या डावीकडे वीरमाडे आहे.) परंतु आपली समाधी धावडशी येथे असावी, अशी इच्छा त्यांनी पूर्वीच दर्शविलेली असल्याने धावडशी येथे त्यांची समाधी बांधून तेथे देऊळ बांधण्यात आले. या स्वामींचा व त्या वेळच्या (पूर्व पेशवाईतील) प्रमुख मराठी मुत्सद्यांचा गुरु-शिष्यसंबंध असे. छत्रपती शाहू महाराज आणि पहिले तीन पेशवे हे या स्वामींचे शिष्य होते. या ठिकाणी असलेले स्वामींचे देऊळ व संगमरवरी पुतळा, गुहा आणि दोन तलाव, तसेच मंदिराच्या महाद्वाराच्या वर एक शिलालेख असून, श्री ब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा १७ ओळींचा शिलालेख आहे. समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडी गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. संपूर्ण मंडपास कडीपाट आहे. सभामंडपात हंड्या व झुंबरे लावलेली आहेत. श्री ब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. झाशीच्या राणीच्या पूर्वजांच्या वाड्याचे अवशेष आजही येथे दिसून येतात. धावडशीला साताऱ्याकडून किंवा पुण्याकडून आल्यास वर्ये गावातून गाडीरस्ता आहे.
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्रसरस्वतीनायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. १६९८ साली ते कोकणातील परशुरामक्षेत्री वास्तव्याला आले. कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ हे त्यांचे निस्सीम भक्त होते. ताराबाई-शाहू कलहात शाहूंच्या पाठीशी या दोघांनाही उभे करण्यात ब्रह्मेंद्रस्वामींचे मोठेच योगदान होते. छत्रपती, पेशवे, त्यांचे सरदार अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे गुरू असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचे राजकारणातसुद्धा चांगलेच वजन होते. त्यांनी उच्चारलेले शब्द खरे होतात अशी त्यांची कीर्ती होती. त्यांचे प्रस्थ एवढे होते की एकदा जंजिरेकर सिद्दय़ाचा एक सरदार सिद्दी सात याने चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची नासधूस केली. स्वामींनी त्याचा लढाईत नायनाट होईल असा शाप दिला. जंजिरेकर सिद्दी स्वामींचा भक्त होता. आपल्या सरदाराची चूक त्याला समजली आणि त्याने लुटीची रक्कम तर परत केलीच शिवाय नुकसानभरपाई म्हणून चिपळूणचे परशुराम मंदिर पुन्हा बांधून दिले. पुढे चारच वर्षांनी मराठय़ांशी झालेल्या लढाईत सिद्दी सात मारला गेला. या प्रसंगाने उद्विग्न झालेले स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले.श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.त्यालाच लागून चार बांधीव तलाव आहेत. त्यांचा काळही अडीचशे-तीनशे वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. तीन मोठ्या आकाराचे, तर चौथा लहान, हौदासारखा. हे चारही तलाव एका साखळीसारखे एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक तलावाचा पाण्याचा वापर ठरलेला. सर्वांत वरचा तलावाचं पाणी देवाशी संबंधित स्वयंपाकासाठी, पुढच्या तलावाचं पिण्यासाठी, मग अंघोळीसाठी, शेवटी कपडे धुण्यासाठी. त्यानंतर हे पाणी ओढ्यात जातं आणि शेतीसाठी वापरलं जातं.या तलावांची गंमत म्हणजे इथलं पाणी एकाच दिशेनं वाहतं- पहिल्या तलावाचं दुसऱ्यात, दुसऱ्याचं तिसऱ्यात.
परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे. जनावरे आणि माणसांसाठी पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो.
मंदिराची रचना आणि बांधकाम सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागी श्रीब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा सतरा ओळींचा शिलालेख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत. त्यांच्या रचनेतील विविधता, कल्पकता व प्रमाणबद्धता -त्यांतील हस्तलाघव उल्लेखनीय आहे. मंदिराचा आधुनिक काळात जीर्णोद्धार करण्यात आला. त्यायोगे मंदिराच्या शोभेत भर पडली आहे.
स्वामींचे उपास्य दैवत - श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला उत्तराभिमुखी, पेशव्यांनी बसवलेली शेंदरी रंगाची सर्वांगसुंदर अशी गणेश मूर्ती आहे. डाव्या बाजूला उत्तराभिमुखी अष्टभुजादेवीची चित्तवेधक मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी दगडात कोरलेले मोठे कासव आहे. ते धावडशीकरांचे न्यायपीठ आहे. खरेखोटे करण्यासाठी त्या कासवावर उभे राहून श्री स्वामींची शपथ घेण्याची प्रथा आहे. गुन्हेगार अशी शपथ घ्यायला धजावत नाही. दालनाच्या दक्षिण बाजूस औंध संस्थानाचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी भेट दिलेला संगमरवरी दगडातील कलात्मक शिल्प असलेला अडीच फूट उंचीचा आकर्षक पुतळा आहे. दालनाच्या वरभागी आरतीच्या वेळी वाजवले जाणारे दोन मोठे नगारे व मधुर नाद उत्पन्न करणाऱ्या घंटा आहेत. श्रींची आरती भक्तगणांना मंत्रमुग्ध करते तर सुरेल सनईचौघडा साक्षात नादब्रह्माचा आनंद देतो. मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडे गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. मंडपास कडीपाट असल्याने सभामंडप शांत व शीतल बनलेला आहे. उजेडासाठी ठिकठिकाणी जाळ्या व मोठमोठे दरवाजे आहेत. सभामंडपातच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. तसेच, सभामंडपात अनेक संत सत्पुरुषांच्या तसबिरी लावल्या आहेत. सभामंडप हंड्या व झुंबरे यांनी सुशोभित आहे. मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते. सर्वत्र दगडी फरशी आहे. भुयाराची खोली एवढी आहे, की शेजारी खोल असलेल्या तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्यानेच शिवलिंगास स्नान घडते. ते भुयार म्हणजे स्वामींची स्नानसंध्या! ध्यानधारणा व पूजाअर्चा यांनी मंगलमय बनलेले पवित्र असे ते शिवमंदिर होय. भुयारात उजेड येण्यासाठी पूर्व बाजूंस मोठी जाळी असून, त्यातून तळ्यातील निळ्याभोर पाण्याचे दर्शन होते. भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. भार्गव मंदिराचे सर्व आवार दगडी फरशीयुक्त असून, शेजारी पुष्पवाटिका, वृंदावने व सुबक दगडी बांधकामातील सुंदर अशी चार तळी आहेत. त्यांपैकी शिवमंदिरास लागून तीर्थाचे तळे आहे. तळ्यातील सुंदर निळेभोर पाणी व सुरेख, रेखीव तळ्याचे दगडी बांधकाम मनाला आनंद देते. तळ्यास लागून पूर्व बाजूस प्रशस्त उमाउद्यान आहे. तेथे विविधोपयोगी अशी सुंदर वास्तू उभी आहे. त्यास लागून ग्रामदैवत श्री वाघजाई देवीचे श्रीस्वामींनी बांधलेले नमुनेदार मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. गावभोजन, विविध कार्यक्रम, सभासंमेलने यांसाठीही धर्मशाळेचा उपयोग होत असे. स्वामींचे स्मारक व पुण्यस्मरण म्हणून त्या वास्तूत ‘श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल’ सुरू करण्यात आले आहे. जणू काही तो परिसर विद्येचे माहेरघर बनू पाहत आहे. श्रीब्रह्मेंद्रस्वामी म्हणजे धावडशीकरांचे आराध्य दैवत. श्रावण शुद्ध नवमी ही स्वामींची पुण्यतिथी. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध नवमी असा नऊ दिवस स्वामींचा मोठा उत्सव साजरा होत असतो. कथाकीर्तने व टाळमृदुंग यांनी परिसर दुमदुमून जातो. गाव आनंदाने व उत्साहाने फुलून जातो. बाहेरून खूप लोक उत्सवासाठी येत असतात. गुळांमपोळी (गुळांबा पोळी) हे त्या भोजनातील वैशिष्ट्य आहे. धावडशी हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पाठीशी नयनरम्य मेरुलिंगाची पर्वतराजी, उदात्त असे भव्य भार्गवमंदिर आणि शांत, प्रसन्न, पवित्र असे वातावरण. श्रींचे दर्शन व प्रसाद यांमुळे तेथे येणारा प्रत्येक भाविक भरून पावतो. त्याचे मन आनंदाने फुलून जाते. तेथे सत्पुरुषांच्या व लोकोत्तर देवेश्वरांच्या मठातील अद्भुत आध्यात्मिक प्रचंड शक्तीचा साक्षात्कार होतो आणि स्वामी या तीर्थक्षेत्रात विशेष रुपाने वास करत असल्याचा प्रत्यय येतो. स्वामी असती भगवंत | तयासी असे दंडवत || घेईल दर्शन जो जो | तोचि एक भाग्यवंत || झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय. सातारा-वर्ये मार्गे धावडशी हे अंतर जेमतेम २५ कि.मी. इतके भरते. गावच्याच मागे मेरुलिंग नावाचा डोंगर असून त्यावर असलेले मंदिर, कोरीव खांब आणि मंदिरासमोरील कुंड बघण्यासारखे आहे. इथून सातारा, अजिंक्यतारा किल्ला, वेण्णा नदी, मेढा, यवतेश्वर, सज्जनगड, चंदन-वंदन किल्ले, जरंडेश्वर असा सारा परिसर अतिशय रमणीय दिसतो.श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.
मेरुलिंग :
धावडशीच्या वरच्या बाजूला डोंगरावर असलेले मेरुलिंग येथील शिवमंदिर विशेष उल्लेखनीय आहे. मेरुलिंग येथे जाण्यासाठी आनेवाडी टोल नाका, तसेच कण्हेर धरणाच्या वरच्या बाजूला भणंग गावाजवळून रस्ता आहे. मेरुलिंग हे निसर्गरम्य ठिकाण असून, डोंगरावर साधारण २५०० फूट उंचीवर आहे. येथे मोर पाहायला मिळतात.
सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. पाच पांडवांनी म्हणजेच युधीष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठ-मोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे. या मंदिरात थोड्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज चार ते पाच वेळा ऐकू येतो. अर्थात प्रतिध्वनी उमटतो. तो ऐकण्यासाठी अनेक भाविक मंदिराच्या थेट गाभाऱ्यात जातात. मंदिराच्या शेजारीच बावडी आहे. या बावडीचे पाणी पिण्यासाठीही वापरले जाते, तसेच गावातील पाळीव प्राण्यांसाठीही या पाण्याचा वापर होतो.
श्रीक्षेत्र महाबळेश्वरसारखेच शंकराचे देवस्थान या गावाला देखील लाभले आहे. यामुळे श्रावण महिन्यात येथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. मंदिराशेजारी असलेल्या बावडीत अनेकजण स्नान करत असतात. येथे एक कुंड देखील असून, त्यामधून गरम पाणी येते. दर सोमवारी येथे जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने वाहने घेऊन किंवा डोंगराचा घाट चढून पायी शिवशंकराच्या दर्शनासाठी जातात. येथे पायी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो. हे पाहून येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन अगदी प्रसन्न होते. या डोंगराचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा डोंगर चढताना मध्यातच एकावर एक अशा भल्या मोठ्या शिळा आहेत.
ऊन, वारा, पाऊस झेलत, न डगमगता त्या एकमेकींवर अगदी दिमाखात उभ्या आहेत. डोंगर चढताना प्रथमदर्शनी असाही भास होतो की, पावसाने किंवा हवेने या शिळा खाली पडून आपल्या अंगावर तर येणार नाहीत ना? श्रावणाच्या काळात मेरुलिंग ग्रामस्थांकडून बाहेरील गावावरून येणाऱ्या भक्तांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. दर सोमवारी येथील मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. देणगी स्वरूपात आलेला पैसा हा देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जातो. सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे गाव महादेव मंदिरासोबतच पर्यटनासाठीही प्रसिद्ध मानले जाते.
सातारा व मेढा शहरात हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ, पाटेश्वर आदी ठिकाणं पाहता येतील. मेढ्यातील मुक्कामानंतर पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी सहज जाणे शक्य आहे.
कण्हेर धरण :
उरमोडी नदीवर कण्हेर या गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. उरमोडी धरणाचे पाणी बोगदा काढून कृष्णा खोऱ्याकडे वळविण्यात आले आहे. हा सातारा जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्प आहे. हे पाणी सांगली जिल्हा, तसेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला दिले जाते. धरणाच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शालू नेसलेल्या उंच पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
कुसुंबी :
श्री काळूबाईचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक येथे येत असतात. श्री काळूबाईचे हे मूळ ठिकाण मानले जाते. कण्हेर धरणाच्या जलाशयाच्या दक्षिण बाजूला हे मंदिर साधारण १० किलोमीटरवर आहे.
केळघर धबधबा :
कण्हेर धरणाच्या पुढे मेढामार्गे महाबळेश्वर रस्त्यावर केळघर गावाजवळ एक छोटा धबधबा आहे. या भागात पावसाळ्यात डोंगरातून पडणारे अनेक छोटे-मोठे धबधबे दिसतात.
सातारा तालुका पर्यटनस्थळ :-
आता आपण सातारा तालुक्यातील पुर्वभागातील पर्यटनस्थळांची माहिती घेउया.या परिसरात संगम माहुली,जरंडेश्वर, कल्याणगड उर्फ नांदगिरी, साखरगड्,लिंबची विहीर्,पाटेश्वर अशी पर्यटनस्थळ आहेत.
पाटेश्वर मंदिर व लेणी ( देगाव -सातारा)
पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सातारा हे असंच एक टुमदार शहर. शहराचा पसारा काही फार नाही, परंतु त्याला इतिहास खूपच मोठा. अजिंक्यतारा किल्ल्याच्या मांडीवर पहुडलेल्या या सातारा शहराच्या जवळच एका डोंगरावर असलेलं भन्नाट आणि वैशिष्टय़पूर्ण असं ठिकाण म्हणजे पाटेश्वर. सरत्या पावसाळ्यात अगदी वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर पाटेश्वरला पर्याय नाही. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पाटेश्वराचे अप्रतिम मंदिर व लेणी आहेत.पाटेश्वर डोंगर माथ्यावर एकूण तीन लेणी समूह व एक मंदिर समूहाशिवाय अन्य देखील मंदिरे आहेत. सातारा ते सातारा एम.आय.डी.सी ७ किमी व सातारा एम.आय.डी.सी ते देगाव ७ किमी अंतर आहे. देगावला जाण्यासाठी सातार्याहून सिटी बस व रिक्षाची सोय आहे. देगाव बस स्थानकाच्या मागील डोंगरावर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पावसाळा सोडून इतर ऋतुत जीप सारखे वहान जाऊ शकते. या रस्त्याने आपण पाऊण तासात चालत पाटेश्वरला पोहोचतो.
येथे पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ४ वरील सातारा शहराच्या पुढे कोल्हापूरला जाताना बोरगाव हे ठिकाण असून येथे येता येते तर राज्य महामार्ग क्रमांक ७३ वरील चिचणेंर वंदन वरून दुसरा निगडी व तिसरा राजेवाडी या गावाहून मार्ग आहे.
देवांचे देव म्हणून श्री महादेव या देवांचे महत्त्व अनादि काळापासून हिंदू धर्माच्या लोकांच्या हृदयात आहे. शिव-शंभूचे निवासस्थान एकतर गिरिदुर्गावर किंवा स्मशानात असते असा लौकिक सामान्यजनात कायमचा ठसलेला आहे. तेहतीस कोटी देव ही संकल्पना हिंदूंच्या हृदयी ठाम असल्याने अनेक देवांनी दिलेल्या वरामुळे पृथ्वीवर कधीकधी अत्याचार होत होते. अशावेळी इतर देव भगवान शिवांस अत्याचार करणाऱ्या दानवी प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची विनंती करीत. मग शिव अवतार घेऊन त्या दुष्टाचे समूळ निर्लमून करीत. अशाप्रकारे पृथ्वीवरील अत्याचारी शक्तीचा " शिव-युक्ती "ने नाश होऊन समाज भयमुक्त होत असे.
महादेव नेहमीच गिरिशिखरांवर तपसाधना करीत असतात असा प्राचीन ग्रंथातून उल्लेख आढळून येतो. कैलास पर्वतावर महादेवाचे जास्तीतजास्त वास्तव्य असल्यामुळे शिवकैलास असाच उल्लेख आपणास नेहमीच पुराण ग्रंथात दिसून येतो. भारतातील प्रमुख शिवमंदिरे ही बहुधा घनदाट वृक्षराईंनी आच्छादित गिरिस्थळी असल्याचे दिसून येते. त्या शिवाय जी शिवालये नागरी वस्तीत असतात ती प्रामुख्याने नदी, ओढा यांच्या तीरावर निर्माण केलेली आहेत. जलसंस्कृतीच्या काठावर मानवी वसाहती हे तर आपले वैशिष्ट्य आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. शिवभक्ती व आराधना मराठी माणसाच्या रक्तात आहे. ब-याच शिवमंदिरांच्या निर्मितीचा कालखंड हा ज्ञात नसल्यामुळे, सामान्यतः ती पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत बांधली आहेत असा सर्वसामान्य लोकांचा समज असतो पण त्यात कोणतेही तथ्य नसते.
पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते. सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे सातार्याला जाणार्या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी.
सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगाव इथे पाटेश्वरचा फाटा आहे. गाडीरस्ता पुढे जाऊन एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो.
देगांवपासून सुमारे दिड ते दोन कि. मी. अंतरावर असलेल्या खिंडीतील वाहनतळापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन सहजपणे जाते. तेथून पुढे सुरू होते आपले पदभ्रमण म्हणजेच पायी चालणे. अरुंद पण सपाट पाऊलवाट, दोन्ही बाजूला विपुल निसर्ग संपदा. थोडेफार अंतर चालून गेल्यावर आपल्याला दगडी पाय-या असल्याचे दिसून येते.
सुरवातीच्या काही दगडी पायऱ्या चढल्यावर उजव्या बाजूला विसावलेली अतिशय प्रेक्षणीय अशी श्री गणेशाची पुरातन मूर्ती दिसताच नकळत आपण गणेश दर्शनासाठी दोन्ही हात जोडून नतमस्तक होतो. शेंदूर लावल्याने मूर्तीचे पुरातन सौंदर्य व अस्तित्व दोन्हीही लुप्त होत आहे अशी भावना मनात साहजिकच तयार होते. ब-याच ठिकाणच्या मंदिरात असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती ह्या लेपांच्या आवरणाखाली असल्याने त्यांचे सौदंर्य व प्राचीनत्व लोप पावलेले आहे, अशीच काहीशी परिस्थिती येथील मूर्तीच्या बाबतीत देखील आहे. गणेशाच्या दोन्ही बाजूला स्त्री वेषातील शेंदूर आच्छादित दोन मूर्ती रिध्दी-सिद्धी असाव्यात.
त्यानंतर काही पायऱ्या चढून गेल्यावर पुन्हा अरुंद पाऊलवाट सुरू होते. चालताना दोन्ही बाजूच्या वनश्रीने नटलेल्या द-या पाहताना निसर्गाच्या किमयेला मनोमन वंदन केले जाते. आजूबाजूच्या झाडावर विविध प्रकारचे पक्षी, वनचर अगदी खारूताई मुक्तपणे झाडांच्या फांद्यावरून फिरताना पाहून मनाला आनंद होतो. तिथून पुढे आपण डोंगर सपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी सभोवतालचा परिसर अप्रतिम दिसतो. शिवाय अधून मधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते. चालताना आपण एकटे नसतो. असंख्य गोड आवाजात गाणारे पक्षी आपल्याला साथ देत असतात.
दहा पंधरा मिनिटांची पायपीट केल्यावर समोर सदगुरू गोविंद महाराजांचा मठ दिसतो.
डाव्या बाजूला भलीमोठी डोंगरदरी तर उजव्या बाजूला भव्य दगडी बांधकामातील चौकोनी पुष्करणी पाण्याने तुडुंब भरलेली दिसून येते. या पुष्करणीचे नाव " विश्वेश्वर पुष्करणी " असून आयताकृती अशी ही पुष्करणी सुमारे ६० चौरस मीटर क्षेत्रपळ असलेली आहे. हिच्या उत्तर दिशेला एक गोमुख आहे तर पूर्वेकडील भागात एक पाय असलेली "अज एकपाद " मूर्ती सुबक कोरलेली आहे, परंतु ते शिल्प कोणत्या देवाचे आहे याची माहिती मिळत नाही.हि शिवाची दुर्मिळ "अजएकपाद"मूर्ती मानली जाते, या शिल्पातील मुर्तीला एकच पाय कोरलेला आहे.या पुष्करणीच्या शेजारीच एक पूर्वाभिमुख असलेली साध्या प्रकारची लेणी आहे. हिच्या आतमधे बांधीव भिंतीवर आयताकृती शाळूंकेवर पाच गोलाकार शिवलिंगे असून त्यांची पन्हळी उत्तर दिशेला आहेत. येथे अन्य विविध प्रकारची शिवलिंगे आहेत. वर चढत जाणार्या पायर्या , वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि मधे मधे भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना.
विश्वेश्वर तळे व मठाच्या दरम्यानच्या जागेतून फरसबंदी पायऱ्यांच्या वाटेने वर चढून गेल्यावर श्री पाटेश्वराचे पूर्वाभिमुख दगडी बांधकामातील अतिशय प्रेक्षणीय मंदिर दृष्टीपथात येते. दगडी पायऱ्या चढून जाताना दोन्ही बाजूला देवकोष्ठे असून त्यात अनेकविध शिवलिंगे ठेवलेली आहेत.
सभोवतालच्या तटबंदीतून मंदिर परिसरात जाण्यासाठी ' कार्तिकस्वामी' नावाचे लहान प्रवेशद्वार पूर्वेकडील बाजूला असले तरी त्याचा फारसा वापर होत नसावा हे जाणवते. उत्तरेकडील बाजूच्या मुख्य दरवाजाने मंदिर परिसरात सर्व भक्त प्रवेश करतात. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस कोपऱ्यात अंदाजे चार फूट उंचीचे विशाल शिवलिंग सहजच दिसून येते, तर त्याचे पाठीमागे भग्न झालेली हनुमान मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूच्या ओवरीत शेंदूर लेपन केलेली आणखी एक वीर हनुमान मूर्ती आढळून येते. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर चोहोबाजूची दगडी तटबंदी व आतील संपूर्ण भागात दगडी फरसबंदी आहे. आतमधे मुख्य मंदिराबरोबरच आणखी लहान तीन मंदिरे आहे. देवळाच्या एका बाजूला अष्ट भुजा व दुसर्या बाजूला भैरव आहे.
नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मुख्य मंदिराच्या समोरील भागात स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या दोन भव्य दीपमाळा आहेत. श्री पाटेश्वर मंदिर व दीपमाळा यांच्या दरम्यान घडीव दगडी चारखांबी मंडपात नंदीची भव्य व तकाकी असलेल्या आभुषणे परिधान केलेली मूर्ती आहे.
नंदीमूर्तीच्या पुढील पाय व गळ्यातील घंटे दरम्यान शिवलिंगावर चवरी ढाळणा-या दोन दासींच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत. नंदीचे दर्शन घेण्यासाठी तीन ते चार पायऱ्या चढून जावे लागते. त्या समोरच सुमारे मीटरभर उंचीच्या जोत्यावर मुख्य मंदिराचा सभामंडप नक्षीदार दगडी खांबावर उभारलेला आहे.
नंदीमंडप
सभामंडपात विविध देवदेवतांच्या देखण्या मूर्ती असल्याचे दिसून येते, यात डाव्या कोनाड्यात शेषशायी, उजव्या बाजूस स्त्रिलिंगी गणपति तर दक्षिणाभिमुख कोनाड्यात बनशंकरीची मूर्ती आहे. त्यानंतर अंतराल मधे जमिनीवर कासव असून त्याच्या सभोवती मत्स्य, मानवी शिल्प व इतर काही शिल्पे असल्याचे जाणवते. मंदिराच्या सभामंडपात महिषासूरमर्दिनी, विष्णू, स्कंद, आणि स्त्रीरूपी गणेश म्हणजेच गणेशिनी किंवा विनायकी अशा मूर्ती कोरलेल्या दिसतात. तर गर्भगृहात पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आहे. जणू काही हे एक शिवपंचायतनच.
महिषासुरमर्दिनी आणि विनायकी
शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती ह्या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे.
चतुर्मुख शिव
हे मूर्तस्वरूप पण साधेसुधे नाही तर चतुर्मुखी आहे. एकाच धडावर एकाच रेषेत चार शिरे कोरलेली आहे. ही मूर्ती ब्रह्मदेवाची म्हणून अगदी सहजच फसगत होते पण नीट निरखून बघायला एका हातात त्रिशुळ तर दुसर्या हातात कमंडलू आणि दंडावर सर्पमुखी बाजूबंद तर डोक्यावर अर्धचंद्र कोरलेला दिसतो. अजूनच काळजीपूर्वक बघता प्रत्येक शिराच्या कपाळावर कोरलेला तिसरा डोळाच दिसायला लागतो आणि हा शंकरच याची अगदी खात्रीच पटते. आहे की नाही गंमत.
गर्भगृह हे सभामंडपाच्या तुलनेत थोडेसे खोलगट भागात असून श्री. पाटेश्वराच्या पिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो. पाटेश्वराच्या शिवलिंगाच्या मागील भिंतीतील देवकोष्ठात चतुर्भुज सरस्वतीची रेखीव मूर्ती स्थापित केलेली आहे. पाटेश्वराच्या मनोभावे दर्शनाने दैनंदिन जीवनात यशस्वी होण्याची आत्मिक शक्ती मिळते. या मंदिराच्या निर्मितीचा निश्चित असा कालखंड ज्ञात नाही, मात्र हे मंदिर साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकातील असावे. तर अठराव्या शतकात सावकार परशुराम नारायण अनगड यांनी जीर्णोद्धार केल्याचे बोलले जाते आणि याची शाश्वती देखील वाटते. कारण सातारा शहराच्या सोमवार पेठ येथे पूर्वी ह्या सावकार परशुराम अनगड यांचा वाडा होता. त्यांनी माहुली येथील रामेश्वर देवालय व एक घाट बांधला होता तसेच महाबळेश्वर येथील कृष्णामाई मंदिराचा देखील जीर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळून येते. महाराष्ट्रात अनेक राजघराण्यांनी देवस्थान विकासाला महत्त्व देऊन विशेष सहकार्य केले आहे परंतु मंदिर, बारव, नदीवरील घाट याच्या निर्मिती व जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. या कारणास्तव देखील पाटेश्वर मंदिर जीर्णोद्धारात अहिल्याबाईंचे सहकार्य नक्कीच झाले असावे असा मनात नैसर्गिकरित्या विचार येतो. पाटेश्वर मंदिराचे शिखर नागरशैलीचे असून त्यात कोनाडे आहेत. भाजक्या विटांचे चुन्याच्या मिश्रणात हे बांधकाम केलेले आहे. मंदिर मंडपावर चौहोकोप-यावर लहान स्तंभ असून मध्यभागी एक लहान शिखर आहे. याच मंदिराच्या डावीकडे अष्टादशभुजामहालक्ष्मीचे म्हणजे महिषासुरमर्दिनीचे मंदिर आहे, व त्याचे शेजारी ब्रम्हदेवाचे छोटेखानी सुरेख मंदिर आहे. पाटेश्वर मंदिरसमूहाच्या दक्षिणेस डोंगरमाथ्यावर कार्तिकेयाचे लहान मंदिर असून येथे मूर्तीसमोर देखील एक शिवलिंग आहे.
पाटेश्वरचे मंदिर हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व ४ फूटी उंच शिवलिंग यांची प्रमाणबध्दता व यावरील तकाकी पहाण्यासारखी आहे. पाटेश्वर बघण्यातील खरी मजा मात्र हे मंदिर बघण्यात नाही तर ती आहे इथला अद्भूत लेणीसमूह बघण्यात, इथली तर्हेतर्हेची शिवलिंगे बघण्यात, इथल्या गूढरम्य वातावरणात हरवून जाण्यात
याची सुरवात होते ती मठाजवळच पायर्यापांशी असलेल्या एकमुखी शिवलिंगाने. पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे, या लेण्याला मरगळ म्हशीचे लेणे म्हणतात.या लेण्यात मृतावस्थेत पडलेल्या म्हशीच्या पाठीवर शिवलिंग दाखवलेले आहे. याचा संदर्भ महिषासूर मर्दनाच्या पुराणातील कथेशी असावा. या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत.
एकाच वेळी सयोनी, अयोनी आणि मूर्तरूपात असलेली अशी शिवलिंगे विरळाच. सयोनी शिवलिंग म्हणजे आपण नेहमी शाळूंकेसहित जे शिवलिंग पाहतो ते तर अयोनी म्हणजे खालची शाळूंका नसून फक्त वरचा लिंगस्वरूपाचा भाग असलेली पिंडी. चौकोनी शाळूंका तिच्यात कोरलेले मुख्य दाढी मिशा असलेले एकमुखी शिवलिंग आणि बाजूने कोरलेली अयोनी पद्धतीची ५७ शिवलिंगे अशी याची रचना. तर याच्या बाजूलाच एका शिवपिंडीच्या शाळूंकेत एक मुख्य सयोनीज शिवलिंगे आणि त्याच्या बाजूने सरळ उभ्या रेषेत कोरलेली असंख्य लहान लहान सयोनीज शिवलिंगेच कोरलेली आहेत तर अजून थोडे पुढे जाताच एक आयताकार शिवलिंग दृष्टीस पडते शिवलिंग व त्यापुढच्या तीन शिल्पपटात ५ अयोनीज पद्धतीची लिंगे, मध्ये कलश तर त्याच्या बाजूला एका परत एका वर्तुळात कोरलेली पाच अयोनीज शिवलिंगे. जणू पंचमहाभूतांचे हे प्रतिकच.
एकमुखी लिंग
सयोनीज शिवलिंगे
पंचमहाभूतांचे प्रतिक असलेले शिवलिंग
श्री. पाटेश्वराचे दर्शन घेऊन परत पुष्करणी जवळ आल्यावर समोरील बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यावर दुसरा प्राचीन लेणीसमूह पाहण्यास मिळतो. पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात आहे.सुरूवातीसच खडकात खोदून तयार केलेली लहानसे बांधीव पाण्याने भरलेले टाके दिसून येते. यातील पाणी पिण्यासाठी वापरत असावेत. त्याच्या शेजारीच चार लेणीगृह असून त्यापैकी उत्तराभिमुख तीन व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. येथील प्रत्येक लेण्यात विविध आकाराच्या अनेक शिवलिंग आहेत. या लेण्यास " नंदिकेश्वर लेणी " म्हणून संबोधतात.
आता मठाच्या बाजूने खालच्या बाजूने जाता जाता मुख्य लेणीसमूहाचा परिसर लागतो. ह्या लेण्या अत्यंत प्राचीन. ह्यांच्या काळाचा मागोवा घेतला असता त्या कमीतकमी १०००/१२०० वर्षे तरी जुन्या आहेत हे लक्षात येते. सातार्याच्या ह्या भागावर राज्य होते ते शिवभक्त शिलाहारांचे तेव्हा यांच्याच राजवटीत ही लेणी खोदली गेलेली असणे हे सहज संभवनीय आहे. पण हा सगळाच लेणीसमूह तांत्रिक शिवभक्तीचा प्रकार वाटतो. सुरुवातीच्या एका गुहेत सयोनी शिवलिंगे तर त्याच्या शाळूंकेभोवतीच कोरलेली लहान लहान शिवलिंगे अशा स्वरूपाचा शिवलिंगांचा एक समूहच दृष्टीस पडतो तर बाजूच्या दोन गुहांमध्ये विशाल शिवलिगे दृष्टीस पडतात एका गुहेमध्ये कमरेएव्हढे पाणी तर दुसरी गुहा कोरडी आणि त्यातही गंमत म्हणजे शिवपिंडीच्या शाळूंकेचा निमुळता भाग हा नेहमी लिंगाच्या उजव्या बाजूकडे असतो येथे मात्र लिंगाच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे. हा तंत्रपूजेचा एक प्रकार दिसतो.
विशाल शिवलिंग
शिवपिंडी समूह
पश्चिमाभिमुख लेण्यात एकच मोठे शिवलिंग आहे तर यात नवग्रहपट देखील ठेवला आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या लेणीमधे तीन शिवलिंगे व शिल्पे आहेत. पाट्याच्या आकाराच्या दगडावर वैविद्यपूर्ण शिवलिंग सुबकपणे कोरल्याचे पाहावयास मिळते आणि श्री पाटेश्वर या नावाचा काही संदर्भ याच्याशी निगडीत आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. मध्यभागी असलेल्या लेण्यात विविध शिवलिंग व शिव अवतार कोरले असून अत्यंत महत्त्वाचे म्हणजे 'रुद्रलिंग' व ४८ लिंगे असलेले लिंग आहे. ह्या लेणीच्या पुढ्यातच अजून एका गुहेत एक अद्भूत मूर्ती आहे. हा मुळचा गुहेचाच भाग पण याच्या बाजूने आता मंदिरासारखे बांधकाम केलेले आहे.हे उत्तरमुखी अग्नीवृषाचे मंदिर आहे. सुमारे अठराव्या शतकात याचे बांधकाम झाले असावे. या मंदिराचे शिखर हे योगी किंवा ऋषींच्या समाधीस्थानाच्या शिखरासम भासते.
आतली मूर्ती संपूर्ण कोरीव आहे. बैलासारख्या दिसणार्या चेहर्यात मानवी मुख कोरलेले आहे. ही मूर्ती आहे अग्नीची-अग्नीवृषाची. सात हात, प्रत्येक हातात कोरलेले आयुध किंवा हस्तमुद्रा, दोन मस्तके, तीन पाय असलेली ही मूर्ती समोरून न पाहता बाजूने पाहिली असता हुबेहुब नंदीचीच दिसते. समोरून पाहताच दाढीधारी मानवाच्या बसलेल्या मूर्तीचे दर्शन होते मात्र आत जाऊन पाहिल्यावर लक्षात येते की त्या साधूच्या पाठीशी वृषभ आहे.हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नागपुडी प्रमाणे दिसतात.या मुर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबध्दता, व शिल्पकाराची कल्पकता "अग्नी-वृष"ची मुर्ती प्रत्यक्ष पाहूनच अनुभवता येते. मानव व वृषभ यांची ही अग्नीवृषाची मूर्ती म्हटली जाते. समोरच्या बाजूने दिसणारा दाढीधारी मानवाला सात हात असून प्रत्येक हातातील विविध आयुधे मोठ्या कल्पकतेने शिल्पात कोरली आहेत.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे. अग्नीवृष
हा लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो तटांनी बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच तर्हेने कोरलेला आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो.
लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारातील नंदी
शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार
चतुर्मुख शिवलिंग
घट असलेले शिवलिंग
एका दगडावर दोन शिवलिंगा ऐवजी दोन कलश दिसतात, ती 'कुंभेश्वर' किंवा 'चतुर्मुख लिंग' या नावाने संबोधले जाते.
लेणीसमूह एका वेगळ्याच कोनातून
यापुढील वर्हाडघर हा ३ लेण्यांचा समुह आहे. येथे शिवपार्वती विवाह समयी लग्नाला आलेले सर्व देवदेवता व-हाडी राहिले होते अशी दंतकथा सांगितली जाते. ह्या व-हाडघरच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला असलेली एकमेव दगडी दीपमाळ अखेरच्या घटका मोजत आहे कारण दिपमाळेचा वरपासून मध्यापर्यंचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला आहे. व-हाड घरात प्रवेश करताना ' सवत्सकामधेनू'चे शिल्प प्रथम दृष्टीस येते. जमीनीवर सुंदर नंदी आहे असून त्याच्या गळ्यातील घंटेखाली लाडूने भरलेले भांडे दर्शविले आहे. आतील व्हरांड्यात गेल्यावर एका भल्या मोठ्या वाड्यात गेल्याचा भास होतो. मधील व्हरांड्यातून निरभ्र निळे आकाश दिसते तर तीनही बाजूला बांधकाम केलेले आहे तर एका बाजूला असलेल्या खडकातील लेण्या आहेत. समोरच्या खडकात खोदीव दालनातील शिवलिंग पाहून तत्कालीन शिवभक्तीची कल्पना मनाला सुखावते. मध्यभागी भव्य शिवलिंग आहे तर यावर लहान लहान शिवलिंग कोरलेल्या असून एकाच दर्शनात शेकडो वेळा शिवदर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. आत प्रवेश केल्यावर डावीकडे विविध मूर्तीच्या पाठीमागे शेकडो शिवलिंग कोरलेल्या लेण्याच्या भिंतीचा भाग आहे.
पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे ह्याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. ह्या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इतल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो. गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतिक. तर याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.
ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डॉळे सरावल्यावर ह्याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेत आहे. ह्याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत तर दुसर्या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत
.
कमलफुलाचे लिंग व शिवलिंगवाहू नंदी
अजून काही वेगळे प्रकार
सहस्त्र लिंग
त्या गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. ह्या गुहेत विविध तर्हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र ह्या सगळ्या शिवपिंडीच्या सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.त्याचप्रमाणे दशवतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, चामुंडा, कार्तिकेय इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. या लेणी समुहास " बळीभद्र " लेणी समुह म्हणतात. या दुसऱ्या लेणीसमूहापासून तिसऱ्या लेणीसमूहाकडे जाताना दुसऱ्या लेणीसमूहाशेजारीच लहान वटेश्वर मंदिर आहे.
डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे
तेथीलच एक शिवलिंग
ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ह्या गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख असलेले भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यांमध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.
बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतिक तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीने सुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच. याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकार
मुख्य गुहा त्यामधील सहस्त्रलिंगासह, मागच्या बाजूला एक शिवलिंगपट
शिवलिंगपट
सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट
शिवदंड
नागप्रतिमा
दगडी खांबावर शिवलिंगातून नाग प्रतिकृती कोरलेली आहे म्हणजेच 'कुंडलिन्' आहे.
गुहेच्या मध्यभागातील प्रमुख सहस्त्रलिंग
याशिवाय लेण्यात देवनागरी लिपीतील (संस्कृत मधील) शिलालेख आहेत, परंतू पुसट झाल्यामुळे शिलालेख वाचता येत नाहीत. बाजूलाच एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते.
खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
हजारो शिवलिंगाचे दर्शन व पुण्य मिळण्याचे भारतातील एकमेव ठिकाण असावे असे वाटते. मूर्ती विज्ञानाच्या अभ्यासकांनी या सर्व मूर्तीचे विश्लेषण करून सामान्य जनांपर्यत याची माहिती उपलब्ध करून द्यावी असे मनापासून वाटते. आपल्या प्राचीनकाळातील पूर्वजांनी केलेल्या अपार कष्टाची महती व हिंदूंच्या धार्मिक दृष्टिकोनातून याचे विश्लेषण होणे फार महत्त्वाचे आहे.
हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वंजांच्या अपार कष्टाचे थोडे बहूत चीज झाले असे अभिमानाने म्हणावे वाटते. येथे शिवलिंगाच्या एकमुखी, ७२ लिंग असलेले, मत्स्यकूर्मशिव, यंत्रलिंग, त्रिपीठलिंग, रूद्रलिंग, कुंभेश्वर लिंग, चतुर्भुज लिंग, पंचलिंग, अष्टादशलिंग, त्रिलिंग, शतकलिंग, सहस्त्रलिंग, भैरवलिंग, पंचलिंग व कमललिंग इत्यादींचे मनोभावे दर्शन घेता येईल. त्याचप्रमाणे अज एकपाद, अष्टादशभुजामहालक्ष्मी, शेषशायी, सरस्वती, कार्तिकेय, त्रिपुरा, सुरसुंदरी, अष्टमातृका, नागशिल्प, गरुड, ब्रम्हा, वैनायकी, दुर्गा, अग्निवृष, चामुंडा, नवग्रह, सूर्य इत्यादी मूर्तींचे निरिक्षण करता येईल.
एकूणात पाटेश्वराच्या अद्भूत लेणीसमूहाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या रहस्यमयतेत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच.अगदी रम्य परिसर. इथून पाय काही निघत नाहीत. इथूनच जवळ जरंडेश्वर आणि नांदगिरी हा किल्लासुद्धा पाहता येईल. दोन दिवस भटकण्यासाठी काढले तर सातारा इथे मुक्काम करून एक दिवस जरंडेश्वर आणि नांदगिरी किल्ला आणि दुसऱ्या दिवशी सहस्रिलगी पाटेश्वर अशी ऐन पावसाळ्यातली निराळीच भटकंती करता येईल. स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न पाटेश्वर आपल्या स्वागतास कायमच सज्ज आहे. हर हर महादेव !
स्थळभेटी बाबत माहिती
पुणे - सातारा -देगाव. भोजन व्यवस्था पाटेश्वर येथील मठात होऊ शकते मात्र निवास सातारा येथे होऊ शकतो.
संदर्भः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) श्री.सागर बोरकर यांचे लिखाण
३) श्री.आशुतोष बापट यांचे लिखाण
४) श्री.सुरेश शिंदे यांचे लिखाण
माहुली
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी. :अंतरावरून कृष्णा नदी वहाते. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत.या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो.या ठिकाणी मध्याश्म युगातील म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २५०० ते ८००० या कालखंडातील प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी प्राथमिक अवस्थेतील अणकुचीदार पाषाणशस्त्रे सापडली आहेत. जावळी येथे सर्वांत जास्त म्हणजे ३५० अणकुचीदार शस्त्रे सापडली आहेत.
खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे. कारण माहुली सारख नितांत सुंदर ठिकाण चालू घडीला मृत्यूपश्चात होणार्या संस्कारासाठीच जास्त ओळखले जाते. कृष्णेनदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वत रांगात होतो ,तर तीन राज्ये सुजलाम सुफलाम करीत ती आंध्रप्रदेशात बंगालच्या उपासागरास जाऊन मिळते .या साधारण आठशे मैलाच्या प्रवासात तीचा काही छोट्या मोठ्या नद्या बरोबर संगम होतो.त्या त्या ठिकाणी मोठी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यातील प्रमूख ठिकाण म्हणजे सातार्यातील कृष्णा-वेण्णा संगम .अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण सुप्रसिध्द असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे . क्षेत्रमाहुलीचा इतिहासही असाच मनाला भिडणारा आहे.याचा संदर्भ थेट रामायणाशी गाठ घालून देतो. रामायणात युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्याकरिता हिमालयाकडे रवाना होतो. नेमकी संजीवनी ओळखता न आल्याने अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून लंकेकडे प्रयाण करतो. लंकेकडे जाताना वाटेत द्रोणगिरीचा छोटा भाग सातारा येथे पडतो यालाच जरंडेश्वरचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आणि कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमाने पवित्र झालेलं हे गाव श्री क्षेत्र माहुली म्हणून प्रसिद्ध आहे. संगमाच्या एका काठाला विश्वेश्वर मंदिर हे संगम माहुली म्हणून ओळखले जातं. दुसऱ्या काठाला रामेश्वर मंदिर हे क्षेत्रमाहुली म्हणून प्रसिद्ध आहे.
कृष्णा नदीची वळणे
क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार. १७०७–४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०). पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीतील असून चुनेगच्ची सभास्तंभ, शिखर आणि कोनाड्यांतून मूर्तिकाम आढळते. क्वचित काही ठिकाणी भित्तीचित्रे आहेत. त्यांतील लक्ष्मीचे चित्र सुरेख आहे. चुनेगच्चीतील मूर्तीत प्रामुख्याने दशावतार, शंकरपार्वती आणि शैव परिवारातील देव-देवता, प्राणी इ. आढळतात. बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत. छ. शाहू पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगोपात्त या स्थळास भेटी देत. उत्तर पेशवाईतील इतिहासप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे या न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली असून रामशास्त्रीच्या वारसांनी त्यांच्या नावे सामाजिक न्यायासाठी एक पुरस्कार १९८४ पासून सुरू केला आहे. दुसरा बाजीराव व जॉन मॅल्कम यांची भेट व बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज-मराठे युद्धापूर्वी (खडकीचे युद्ध) येथेच झाली. माहुलीला शेवटच्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कन्यागतात येथे अनेक लोक संगमावर स्नानांसाठी जमतात. छत्रपती घराण्यातील छ.शाहू त्यांची राणी सकवरबाई, कुत्रा खंड्या यांच्या येथे समाध्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे. मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे. मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे) नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली . माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते सगुणेश्वराचे मंदिर .१८६५ च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ. शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले. १५० वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे . मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही छ.शाहूमहाराजांचा “खंडया” नावाचा एक श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे .
शाहू महाराज समाधी
नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब महाराजांची आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे ३०० वर्षाची परंपरा आहे .याच परीसरात सन १७३० ते १७९० या काळात बांधलेली भैरवनाथ मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदीरे आहे.
इथूनच पुढे गेल्यास अतिशय सुंदर अशी दिपमाळ दृष्टिस पडते .या दिपमाळीकडे चालत गेल्यास आपण पोहोचतो श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात . माहूलीतील हे एकमेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे.अतिशय देखणे असे हे मंदिर १७३४ साली श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी बांधले .मंदिर हेमांडपंथी स्थापत्य शैलीतले आहे. या मंदिराची संरक्षक भिंत सात कोणी आहे. सर्वसाधारण बांधकामात ती अष्टकोणी , षटकोणी आकाराची असते . मुख्य मंदिराच्या समोरच शंकराचे वाहन नंदी चे दगडात कोरलेले सुंदर शिल्प आहे. मंदिराच्या सभागृहात एक मोठी पितळी घंटा बांधली आहे. देव कोष्टकात गणेश आणि महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील दगडी शिवलिंगावर पितळी आवरण चढवलेले आहे. मंदिरासमोरच भव्य दीपमाळा आहे जी अखंड दगडातून बनवलेली आहे. महाशिवरात्र, दिवाळी यावेळी इथे दीपोत्सव असतो. मंदिराचे शिखर वीट बांधकामात बनवलेल आहे . ऊन वारा पाऊस यांना तोंड देत आजही ते सुस्थितीत असलं तरी त्याला संवर्धनाची गरज आहे. त्यावर वाढलेल्या वड, पिंपळ सारख्या झाडांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. मंदिराच्या प्रांगणात, येणाऱ्या भाविकांसाठी किंवा वाटसरू साठी ओवऱ्या आहेत. एकूणच मंदिराचा थाट रुबाबदार आहे. मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर बाजूस ओवर्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू आहे . मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन मंदिराची आठवण होते .मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे .यातील नंदी सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे . या घाटास राजघाट असे म्हणतात .या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलींग स्थापन केलेली एक समाधी दिसते.ही समाधी आहे शाहू नगर म्हणजे आपला सातार्याच्या निर्माते छ. संभाजी महाराजांचे पुत्र छ. शाहू महाराजांची . या समाधीची जागा नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडूजी करुनही तीचा फारसा उपयोग़ होत नाही .
इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी महाराजांच्या पत्नी छञपती महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी होती .परंतू खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या समाध्या वाळू खाली लुप्त होतात .२००५ च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या छञपती महाराणी ताराराणी व रामराजे यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. श्री आमुतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. श्री हरिनारायण मंदिर,श्री व्यंकटेश मंदिर,श्री राम मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री परशुराम मंदिर अशी अनेक जागृत मंदिरे संगम माहुली आहेत.
वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र माहुली असे म्हणतात .‘रामशास्त्री बाण्याचे’ म्हणून प्रसिद्ध झालेले इतिहासातील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे हे गाव. त्यांचा जन्म येथीलच. येथे श्रीरामेश्वराचे सुंदर मंदिर असून, घाट बघण्यासारखा आहे. हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. येथेही नदीला सुंदर घाट बांधला आहे. थोरले बाजीराव जेव्हा साताऱ्याला छत्रपतींची गाठ घेण्यासाठी येत असत, त्या वेळी त्यांचा मुक्काम येथे असे. नदीकाठावर एक जागा गावकरी दाखवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येथे मस्तानी राहत असावी. शेवटचे मराठा व इंग्रज यांच्यात शेवटची लढाई होण्यापूर्वी दुसरा बाजीराव व जॉन माल्कम यांची भेट येथे झाली होती.
ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश कालीन पूल ओलांडूनच जावे लागते . पूर्वी पूल नव्हता, त्या वेळी नदी पार करण्यासाठी नाव किंवा मोठ्या काहिली वापरल्या जात. नावेला बांधण्यासाठी वापरात असलेला चबुतरा साखळीसह अद्यापही अस्तित्वात आहे. हेसुद्धा घडीव दगडांनी बांधलेले सुंदर मंदिर आहे. मंदिराचे नाव रामेश्वर असलं तरी मुख्य मंदिर महादेवाच आहे.मंदिराच्या समोरच महादेवाचे वाहन नंदी आहे पण या नंदीची मान गर्भगृहकडे नसून थोडी बाजूला वळलेली आहे. याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका आहे. या नंदीची शिंगे सोन्याची होती . एक दिवस ती चोरांनी पळवली. लोकांनी बराच शोध घेतला तरी चोर सापडले नाहीत. तेव्हा नंदीने चोर कोणत्या दिशेला गेलेत ते आपली मान वळवून दाखवले. मंदिरा पाठीमागे राम- सीता- लक्ष्मण यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहेत . दोन दीपमाळा आहेत त्यातील एक सुस्थितीत आहे. दीप ठेवण्याची जागा सुद्धा चोचीत माळ धरलेल्या पक्षाचं शिल्प कोरून अलंकृत केली आहे.
इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अनगळांचा घाट म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदीर परशुराम नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .
नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा .मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे. अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो .हा घाट दुसरे बाजीराव पेशव्यानी बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या उजव्या बाजुस बिल्वेश्वराचे मंदिर आहे . हे मंदीर श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी १७४२ चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले अशी माहीती मिळते .
हेलसिंकी येथे कुस्तीमध्ये भाग घेतलेले श्रीरंग पैलवान या गावचेच. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे हे याच गावाचे. त्याचे चिरंजीव चारुदत्त आफळेही त्यांचा वारसा चालवीत आहेत. नखचित्रकार, शिल्पकार, माजी आमदार, डॉ. आंबेडकरांचे सहकारी खंडेराव सावंत हेही माहुली गावचेच.
श्रीक्षेत्र माहुली
महाबळेश्वरी उगम पावलेल्या कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्यापासून जेमतेम ५ कि.मी. असलेल्या माहुली इथे होतो. पेशवाईतील सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचा जन्म याच माहुली गावातला. कृष्णा नदीच्या अलीकडील भागाला संगम माहुली, तर नदीपलीकडील भागाला क्षेत्र माहुली म्हणतात. संगम स्थान असल्यामुळे इथे बरीच मंदिरे पाहायला मिळतात. पकी ताईसाहेब पंतसचिव यांनी बांधलेले श्रीराधाकृष्ण मंदिर, औंधच्या श्रीपतराव पंतप्रतिनिधींनी बांधलेले श्रीबिल्वेश्वर मंदिर, परशुरामपंत अनगळ यांचे श्रीरामेश्वर मंदिर ही काही महत्त्वाची मंदिरे होत. श्रीबिल्वेश्वर मंदिरासमोर असलेल्या श्रीसंगमेश्वर मंदिरावरील लक्ष्मीचे चित्र, फुलपाखरांची नक्षी कौशल्यपूर्ण आहेत. माहुली हे धार्मिक ठिकाण असल्याने सातारकर छत्रपतींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार इथे केले गेले आणि त्यांचीही स्मारक-वृंदावने उभारली गेली.
१५ मोटांची विहीर – लिंबशेरी
अनेक मजले खोल, पाण्यापर्यंत पायऱ्या असणाऱ्या विहिरी गुजरातमध्ये मोठय़ा संख्येने आहेत. पण अशीच एक सुंदर विहीर आहे साताऱ्याच्या अगदी जवळ िलब गावी. साताऱ्याहून पुण्याला जाताना ९ कि.मी. वर िलब फाटा आहे. तिथून तीन कि.मी. आत ही विहीर आहे. शाहू छत्रपतींची राणी वीरूबाई हिने ही पंधरा मोटा असलेली अत्यंत देखणी विहीर बांधली. आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी असलेल्या १५ मोटांच्या खुणा अजूनही दिसतात. विहिरीत आतून व्यालांची शिल्पे दिसतात. तर तिथेच एक कमानदार पूल आहे. त्याच्या वरती एक प्रशस्त दालन आहे. विहिरीवरील या दालनात बसल्यावर अतिशय थंडगार वाटते.
या विहिरीवरील शिलालेखात ‘श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब’ असे कोरलेले आहे. िलब गावात कृष्णामाईचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो.
सोनगाव संमत निंब :
क्षेत्र माहुली गावाच्या पुढे सोनगाव म्हणून एक गाव आहे. येथे कृष्णा नदी झेड आकारात ३० अंशांमध्ये तीव्र वळणे घेते. सोनगावाजवळ वाकेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराच्या तीन बाजूंना कृष्णा दिसते. कृष्णा उत्तरेकडून दक्षिणेला येते व लगेच ३० अंशांमध्ये वळण घेऊन परत उत्तरकडे वळते. थोडे अंतर उत्तरेला गेल्यावर परत पश्चिमेस वळते व परत लगेचच दक्षिणेस माहुलीकडे मार्गस्थ होते. आपण बऱ्याच ठिकाणी इंग्रजी एस आकारात नागमोडी वळणे घेतलेल्या नद्या पाहतो; पण असे वळण क्वचितच पाहायला मिळते.
महागाव :
माहुलीच्या दक्षिणेस महागाव आहे. हे गाव भटजी पैलवान दिवंगत दामोदर बळवंत भिडे गुरुजी यांचे गाव. योगीराज अरविंद त्यांच्याकडे योगसाधनेबाबत चर्चा करण्यासाठी येत असत. ते स्वतः कुस्तीगीर होते व व्यायाम शिक्षक होते. कृष्णधाम :
संगम माहुलीच्या दक्षिण बाजूला साताऱ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्र आहे. त्याच्या खाली थोड्या अंतरावर कोडोली हद्दीमध्ये कृष्णा नदीवरच कृष्णधाम हे सुंदर, निसर्गरम्य सहलीचे ठिकाण आहे. रहिमतपूर रस्त्यावरून कोडोली गावाच्या पुढे डावीकडे कृष्णधामाकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे.
अंगापूर सातारा रहिमतपूर रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यावर जिहे गावाच्या जवळ उजवीकडे अंगापूरला रस्ता जातो. येथे २५० वर्षांपूर्वीचे गणपती मंदिर असून, संपूर्ण परिसराला तटबंदी आहे. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचे प्रांगण फरसबंद आहे.
जरंडेश्वर मारुती देवस्थान
प्रत्येक देवाचे महात्म्य वेगळे, वैशिष्ठ्य वेगळे, असाच महादेवाच्या मुख्य डोंगरारांगेपासून थोडा वेगळा झलेला साताऱ्याच्या सात ताऱ्यांपैकी एक तारा "श्रीक्षेत्र जरंडेश्वर" साताऱ्यापासून पूर्वेला सुमारे १६ किमी अंतरावर असून, स्थानिक लोक याला जरंडा म्हणून ओळखतात. डोंगराच्या माथ्यावर मधोमध वसले आहेत मारुतीराय आपल्या एका वैशिष्ठ्यासह, मूर्तीच्या उग्र चेहऱ्यावर मिशी आहे. पश्चिमाभिमुख गाभार्यात सुमारे चार फुट उंचीची मूर्ती आहे. येथील मारुतीची स्थापना समर्थांनी केली असून, मारुतीचे मंदिर, मंडप, धर्मशाळा, गोविंदबाबा सिधये नावाच्या हनुमानभक्ताने बांधली आहेत. गोविंदबाबांना हनुमानाचा साक्षात्कार झाला होता, असे सांगितले जाते.
आल्हाददायक हवा आणि दमछाक करणारी चढण यामुळे भक्ती आणि शक्तिचे प्रतिक असलेले हे देवस्थान हेल्थकॉन्शिअस लोकांसाठी पर्वणीच आहे. सातारा शहर आणि आजू बाजूचे बरेच नागरिक व भक्त दर शानिवारी येथे येतात. गेल्या काही वर्षांपासून पासून डोंगर चढण्याची स्पर्धा येथे आयोजित येते.
अशी अखायिक सांगितली जाते कि संजीवनी आणण्यासाठी हिमालयात गेलेले रामभक्त हनुमान संपूर्ण द्रोणागिरी पर्वताच घेवून परत आले आणि त्या पर्वतातील एक खडा जमिनीवर पडला तोच हा जरंडेश्वर पर्वत. जाणकार लोक असेही म्हणतात कि या डोंगरावर बऱ्याच औषधी वनास्पती मिळतात. निसर्गाची मुक्त हस्त उधळण, प्रसन्न वातावरण, मंदिर, मठ आणि आजूबाजूच्या परिसराची ठेवण्यात आलेली स्वच्छता, यामुळे मंदिरातील होणाऱ्या विधिवत पूजा अर्चा, हनुमान जयंतीचा सोहळा, रामनवमी, श्रावणी शनिवार, जरंडेश्वर डोंगर प्रदक्षिणा, पालखी सोहळा आणि इतर समारंभाला हजारो लोक दरवर्षी येथे गर्दी करतात.
डोंगरावर जाण्यासाठी दोन मुख्य वाट आहेत व त्यांना मिळालेल्या इतर वाटा देखील आहेत. पहिली वाट सातारारोड-पडळी या गावातून येते हि वाट सरळ चढन आणि खूप दमछाक करणारी आहे या वाटेनी वर यायला सुमारे ४० मिनिट लागतात. प्रशासनामर्फत येथे नुकत्याच पायऱ्या बांधण्याची खडतर मोहीम पाडली आहे. दुसरी वाट जांब या गावातून वर येते हि सोप्पी वाट २० मिनिटात माथ्यावर पोहोचवते. पडळी गावातून येणारी वाट: हनुमानाचा अंगठा: थोडे चढून गेल्यानंतर हनुमानाचा अंगठा म्हणून एक ठिकाण लागते येथे हनुमानाचा अंगठ्याला ठेच लागली असे सांगितलं जातं. तळे: डोंगराच्या मध्याच्या थोडेसे वर पाण्याच्या प्रवाहाला दगडी बांध घातलेला दिसतो. डोंगराच्या ओघळातला खडक आणि सुमारे २० फुट उंच दगडी बांध यात पावसाळी पाणी साठवले जाते. या तळ्यात दोन्ही बाजूनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सध्या मठातील वस्ती आणि भाविकांसाठी याच तळ्याच्या सुमधुर पाण्याचा वापर केला जतो.
लिंब बारामोटेची विहिर
मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता. बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो. विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी आकाराची आहे.
सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या
संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार
विहिरीत उतरण्यासाठी दगडी फरसबंदी पायऱ्या आहेत तर आत उतरण्या अगोदर विहीरीच्या आकारमानाकडे पाहिल्यास भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची ही विहीर असल्याचे सहजच लक्षात येते. काही पायऱ्या उतरुन गेल्यावर चौकोनी आकाराच्या तटबंदीत आल्याचे जाणवते. शेवटच्या पायरीपासून दगडी साकव लागतो. साकवाच्या दोन्हीही बाजूला रूंद दगडी बांधकामातील आयताकृती भलेमोठे हौद असावे असा देखावा दिसतो, तर त्या हौदात उतरणा-या लहान पायऱ्या आपले लक्ष वेधून घेतात. आपण ज्या दगडी साकवावर उभे असतो त्याच्या खाली कमानीचा भाग दोन्ही हौदांना जोडणारा पाहून तत्कालीन स्थपत्तीच्या (बांधकाम अभियंता) ज्ञानाचा आवाका किती असेल याचा अंदाज येतो. याच कमानीवर वीरूबाईंनी ही विहीर बांधली असल्याचा शिलालेख कोरलेला आहे. शेवटच्या पायरी वरुन सपाट दगडी फरसबंदीवर पाय ठेवल्या बरोबर समोर दिसणारे दृश्य अचंबित करणारे आहे. मुख्य विहिरीला जोडणारा दगडी कमानी भाग, तर त्याच्यावर दगडी खांबाचा नक्षीदार सज्जा
मुख्यविहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत ते एका महाल वजा हॉलमध्ये निघतात. येथे खांबावर गणेश , मारुती , अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत.
विविध पक्षी, चित्रे ही दगडी भिंतीतून बाहेर डोकावताना पाहून आपल्या पूर्वजांच्या कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कमानीच्या दोन्ही बाजूची गजशिल्प वैभवशाली अभिरुचीची साक्ष देते. पुढे चालत गेल्यावर कमानीतून विहिरीचे पाणी पाहून आनंद वाटतो, तर कमानीच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला लहान दगडी दादर असून त्याद्वारे आपण नक्षीदार दगडी खांबावर आधारलेल्या आयताकृती महालात प्रवेश करतो. भर उन्हाळ्यात देखील येथील वातावरण शितल असते. आता एका सज्जातून विहिरीतील पाणी दिसते, तर दुसऱ्या सज्जातून पायऱ्या उतरुण आलेली कमान व ती चौकोनी दगडी भिंतीतील साकव दिसतो. विहिरीतील एकच पाणी मात्र खालच्या कमानी, दगडी महल व मोटेच्या ठिकाणाहून वेगवेगळे भासते.
आता दगडी महलातील सौंदर्य पाहिल्यावर पूर्वेस एक दगडी दादर आहे, त्यातून वर आल्यावर आपण विहिरीच्या भूपृष्ठावर असतो. विहीर बांधकामात वरच्या अंतर्गत भागात चार दिशेला चार शिल्प दिसून येतात. गजावर आरुढ झालेला शरभ आहे. हे शिल्प शक्तीवर विजय मिळविल्याचे बुद्धी चापल्य दर्शविते.
वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे! व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत. घुमटाकार चौकटींना पडदे अडकवण्यासाठीच्या खुंट्या पण आहेत. महाराजांची गोपनीय खलबतं करण्याची ही जागा असावी असा समज आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पत्थरात घडवलेले आसन आहे ज्याच्यावर बसून शाहूमहाराज रयतेशी हितगुज करत. हे कातळ पत्थरातील शिल्प पाहून, शिवकालीन आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अभिमान वाटतो.विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.
या विहिरीचे संपूर्ण बांधकाम चुण्यामध्ये केले असल्याने ते इतक्या वर्षानंतरही भक्कम आहे. हिच्या निर्मितीसाठी चांगल्या प्रतीचा दगड वापरण्यात आला आहे. यासाठी डोंगरातून खाण लावून दगड घडविले असतील. दगडी खाणीपासून विहिरस्थळापर्यत अवजड घडीव दगड आणण्याचे कठीण काम करावे लागले असेल. मनात प्रश्न येतो की, कशी केली असेल दगडांची वाहतूक ? मला ही हा प्रश्न पडला. मग मी विचार करु लागलो आणि काहीतरी शोधू लागलो. तर विहिरीच्या पायऱ्या उतरण्यासाठी सुरवात करतो, तेथे उजव्या हाताला काही अंतरावर दोन दगडी चाके असल्याचे दिसून आले. प्रश्ना शेजारीच उत्तर ! गाडबगाडेच्या गाड्यास देखील असेच दगडी चाक असते. बैठ्या लाकडी बैलगाड्यास दगड वाहतूक करण्यासाठी अशी भक्कम दगडी चाके पूर्वी वापरात होती. अशा या कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले यांचे सातारा दरबारी कामकाजात विशेष महत्त्व असल्याचे काही प्रसंगात दिसून येत होते, कारण पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर दुसरे पेशवे म्हणून त्यांचेच पुत्र बाजीराव बाळाजी यांना छ. शाहू महाराजांनी पेशवाईचे वस्त्रे दिल्यावर, रक्षा बिरूबाईने पेशवा बाजीराव पंडित यांस ११० रुपये किंमची व चिमाजी अप्पा पंडित यांस १०० रुपयेची वस्त्रे भेट म्हणून दिली होती. अशी ही कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले २४ डिसेंबर १७४० रोजी निधन पावली आणि त्याचवर्षी म्हणजे इ. स. १७४० मधे पेशवे बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी अप्पा देखील परलोकवासी झाले. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिराच्या ओव-यात वीरूबाईंचा मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांनी त्यांच्या स्मरणार्थ शिवलिंग स्थापन केल्याचा उल्लेख ' श्रीमंत महाराज भोसले बखर' मधे येतो.
लिंब हे गाव बारा मोटेच्या विहिरीमुळे इतिहासात प्रसिद्ध असले तरी काही कटू आठवणी देखील आहेत. इंग्रज राजवटीच्या सुरूवातीच्या काळात सातारा गादीवर छत्रपति प्रतापसिंह महाराज होते. इंग्रज प्रतिनिधी म्हणून सातारच्या दरबारात ग्रॅड डफ हा अधिकारी होता. इंग्रज सरकारला छत्रपतींची अडचण होत होती, म्हणून काहीतरी खोटे आरोप करुन ४ सप्टेंबर १८३९ ला मध्यरात्रीस सातारच्या छत्रपतींना मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कारन्याक याच्या हुकूमाने व क्रिस्टाल याच्या मार्गदर्शनाखाली ओवान्स या अधिकाऱ्याने अर्ध्या रात्री छत्रपतींना अटक केली. छत्रपतींना सातार जवळच्या लिंब येथील एका पाटलाच्या गाई गुरांच्या गोठ्यात ठेवले. इंग्रजी कैदेत छत्रपति ९३ दिवस या लिंब गावी गोठ्यात मुक्कामाला होते. ज्या इंग्रजांच्या प्रतिनिधीने छ. शिवाजी महाराजांना कमरेत वाकून मुजरा करुन नजराना भेट केला, त्यांच्याच वंशाजांच्या हातांनी स्वराज्याच्या छत्रपतींना अटक करून लिंब येथे ठेवले. बारा मोटेची विहीर आठवताना, न कळतच आमच्या स्वराज्याच्या अपमान करणाऱ्या कपटी, धूर्त इंग्रजांची काळी कृत्य मनाला वेदना देतात.
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत. लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
देखभाल
रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि रोहित पवार.
कोटेश्वर शिवमंदिर -- लिंब गोवे
लिंबपासून तीन किलोमीटर अंतरावर कोटेश्वर शिवमंदिर आहे. लिंब येथील कृष्णा नदीच्या पात्रात एका बेटावर हे मंदिर आहे . पूर्वाभिमुख दगडी बांधकामातील शंखाकृती आकाराचे हे मंदिर सुबक आणि सुंदर आहे. या मंदिरात दोन नंदी आहेत.एक मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तर दुसरा नदीपात्रातील कुंडा शेजारी. येथील कुंडाची रचना खूपच सुंदर आहे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कुंडात येते आणि तिथून ते परत कृष्णा नदीच्या पात्रातच विलीन होते. त्यामुळे येथे नदीच्या पाण्यात डुंबण्याची हौस आणि भक्तीभावाचे स्नान या दोघांचाही सुंदर मिलाफ होतो. मंदिराच्या प्रवेश द्वारावर सभामंडपात वरील बाजूस नगारखाना आहे. आरतीच्या वेळी येथील वाद्य वाजवली जातात.
कृष्णा नदीत असलेले कुंड
या मंदिराचा संदर्भ कृष्ण महात्म्य ग्रंथात आढळतो. या मंदिराला पण पौराणिक कथेची झालर आहे. सहस्त्रअर्जुनाने जमदग्नी यांची हत्या केली त्यामुळे रागाने परशुरामाने पृथ्वीला एकवीस वेळा नि:क्षत्रिय केले . आपल्या या कृतीमुळे दुःखी झालेले परशुराम भटकू लागले. याठिकाणी अगस्ती ऋषींनी परशुरामांना पाप मुक्ती साठी रुद्र जप, कृष्ण स्नान व शिव जप करण्यास सांगितले . परशुरामांच्या उग्र तपश्चर्येने शंकर प्रसन्न होऊन त्यांना पापमुक्त केले. परशुरामांच्या विनंतीवरून महादेवाची स्वयंभू पिंड येथे तयार झाली. परशुरामांच्या शतकोटी जपामुळे ती निर्माण झाल्यामुळे या स्थानाला कोटेश्वर मंदिर म्हणतात. महाशिवरात्र व श्रावणी सोमवार दिवशी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला येतात. श्रावणात येथे जत्रा भरते.
या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवाईतील सरदार नारो आप्पाजी खरे यांनी १६६५ मध्ये महाशिवरात्री दिवशी केला.
* येथे येताना पर्यटकांनी आपल्यासोबत बदलण्यासाठी कपड्यांचा एक जोड अवश्य आणावा. मंदिराच्या आवारातील कुंडात कृष्णेच्या जळात मनसोक्त डुंबून महादेवाचे दर्शन घ्याव. चित्तवृत्ती प्रसन्न होतात.
वाटेवरच्या लिंब गोवे गावातील दुर्लक्षित वीरगळ
संदर्भः- १) सातारा जिल्हा गॅझेटीयर २) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख ३) श्री. आशुतोष बापट्,शैलेश करंदीकर, विजय शं.माळी, संकेत फडके,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण नागेवाडी :
बनशंकरी देवीचे सुंदर निसर्गरम्य मंदिर येथे आहे. हायवेलगत साताऱ्याच्या लिंब खिंडीजवळ हे मंदिर आहे.
मर्ढे :
मराठी नवकाव्याचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर यांचे हे मूळ गाव. येथे मर्ढेकरांच्या मूळ गोसावी घराण्याचा एक मठ असून, श्रीरामाचे मंदिरही आहे. स्वत : मर्ढेकर या गावात फारसे राहिले नसले, तरीही आकाशवाणीच्या नोकरीतील निवृत्तीनंतर मर्ढे येथे येऊन शेती करावी, असे स्वप्न मर्ढेकरांनी उराशी बाळगले होते; मात्र ते पूर्णत्वास गेले नाही. ‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो’ ही कविता मर्ढेकरांनी येथेच कृष्णा नदीकाठी लिहिली असल्याचे सांगणारे गावकरी आजही गावात आहेत.
या गावात सन १७०९मध्ये छत्रपती शाहू महाराजांची छावणी होती. कृष्णा नदीच्या काठावरच सिद्धामृत मठाची गढीवजा भव्य दगडी वास्तू उभी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मठाची स्थापना केली आहे. मठाचे तिसरे मठपती अमृतेश्वर यांनी पीयूष रामायण कविताबद्ध, तसेच तत्त्वझाडा हा प्राकृत ग्रंथ लिहिला. पूर्वी या मठात सिद्धामृत विद्यापीठ होते.
वडाचे म्हसवे
येथील वटवृक्ष तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला ‘वडाचे म्हसवे’ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन ‘फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. १८८२मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. १९०३मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कुक थिओडोर या ब्रिटिश नागरिकाने पश्चिम घाटातील वृक्षांची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी २८ प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाईजवळील पाचवड येथून मेढा रस्त्याजवळच हे झाड आहे.
किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर :-
पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्यांसारखे दिसतात. हमरस्त्यावरच भुईंज गावातून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.
किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्या पायर्या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
भव्य चौथऱ्यावर हे मंदिर साकारले आहे. सुमारे १८ पायऱ्या चढून गेल्यावर हा मंदिर समूह आहे. त्यातील दोन भग्नावस्थेत आहेत आणि एक मंदिर त्याचे वैभव टिकवून उभे आहे. हे गाव योद्ध्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या वीरगळांसाठी प्रसिद्ध आहे. तळघरात असलेला गाभारा, अंतराळ, सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. चाळीसगावजवळील कन्हेरगड येथेही अशाच प्रकारचे मंदिर आहे. सभागृहाचे खांब साधारण मध्य कर्नाटकातील मंदिरांप्रमाणे वाटतात; पण यांचे वेगळेपण दिसून येते. गावाच्या पलीकडे चंदन व वंदन हे दोन किल्ले जुळ्या भावाप्रमाणे दिसून येतात.
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत. मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल -----
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्यावरील नक्षीकाम
सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत. आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.
सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत. शिवतांडव १
शिवतांडव २
कलशपूजन करणारे हंस
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच. छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
गर्भगृहे
गर्भगृहे मंदिराचा अंतर्भाग
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागाचा फेरफटका करुया.एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
मंदिराचा बाह्यभाग
दिपमाळा
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊल खूणा जपणाऱ्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे पांडवकालीन भैरवानाथाचे मंदीर भारत सरकारने सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून मंदिर नव्याने जिणोध्दारीत केले आहे. त्याचे मांगल्य पावित्र्य हे किकली देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ जपत आहेत. त्यातच वीरगळींचे गाव म्हणून इतिहास संशोधकांनी राज्यातील पहिले गाव म्हणून नामांकन केले आहे.
किकली गावातील वीरगळी : -
किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
काही वीरगळ
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली दिसतात.
चंदन व वंदन किल्ले हे दोन गड कोरेगाव-वाई तालुक्याच्या सरहद्दीवर आहेत. हे गड जुळे असल्याने त्यांना चंदन-वंदन या नावाने ओळखले जाते. चंदनगडाची उंची २२०० फूट असून, चारही बाजूला उंच शिळा आहेत. गडावर विस्तृत मैदान असून, गैसपाक बाबांचा भव्य दर्गा आहे. हे किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे. जुळ्या भावासारखे हे किल्ले पुणे-सातारा हमरस्त्यावरूनही पूर्वेला दिसतात.
कवठे :
माजी खासदार आबासाहेब तथा किसन वीर यांचे हे गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात स्वातंत्र्यसैनिक आहे. १९४२च्या लढ्यामध्ये आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या गावाने झोकून दिले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांच्या हालचालीचे हे एक प्रमुख ठिकाण होते. आबासाहेब वीर यांचे मोठे स्मारक पुणे-सातारा रस्त्याच्या पूर्वेला लागूनच आहे. शेजारी असलेले बोपेगाव हे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे गाव.
किसन वीर साखर कारखाना :
येथील मुख्य आकर्षण म्हणजे हुतात्म्यांचे स्मारक. मुंबईवरील हल्ल्यात वीरगती मिळालेल्या जवानांची शिल्पे येथे तयार करण्यात आली आहेत. तसेच वाई तालुक्यातील वीरगती मिळालेल्या जवानांचेही स्मारक आहे.
इब्राहिमपूर शिवमंदिर
भुंईजजवळचे चंदनगड आणि वंदनगड हे बहुतेक दुर्गभटक्यांच्या परिचयाचे.मात्र बहुतेक जण या गडावर जातात ते भुइं़-किकली-बेलमाची मार्गे.मात्र थेट चंदनगडावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे.चंदनगडाच्या पुर्व पायथ्याला इब्राहिमपूर नावाचे गाव आहे. कोरेगाव तालुक्यातलं हे लहानखुरं खेडं. एरवी ते फार कुणाच्या लक्षात राहिलं नसतं. मात्र चंदनगडामुळं त्याची थोडीफार ओळख निर्माण झाली आहे. अर्थात या ओळखीत स्वतःची भर घालणारं एक अप्रतिम शिवमंदिर या गावात आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की माहितीअभावी म्हणा वा प्रसिद्धीअभावी लोकांची आवर्जून पावलं इकडं वळत नाहीत. अशी कैक प्राचीन, ऐतिहासिक स्थळं आपल्या अवतीभवती असतात, दिसतात. मात्र त्यावर फारसा ‘फ्लॅश’ वा ‘फोकस’ पडलेला नसतो. मग ती उपेक्षेचाच धनी बनतात. इब्राहिमपुरातील शिवमंदिर याच पंक्तीत बसणारं.
सातारा- लोणंद रस्त्यावर पश्चिमेस इब्राहिमपूर. मुख्य रस्ता गावात जाणारा. शेजारीच हे मंदिर. मात्र त्याचं प्रवेशद्वार उत्तराभिमुखी. बाहेरून पाहिलं तर असेल एखादं पुरातन मंदिर असंच वाटतं खरं. मात्र मंदिरात गेलं, की अचंबित व्हायला होतं. विशेषतः मंदिराची स्थापत्यकला थक्क करायला लावणारी आहे.
गावकरी या मंदिराला पांडवकाली मानत असले तरी हे प्राचीन मंदिर दुर्लक्षित वाटतं. पडझडीच्या मार्गावर दिसतं. तरी त्यातलं अस्सलपण कायम आहे.मंदिराचं गर्भगृह खोल असून त्यात महादेवाची पिंड आहे. आत पूर्ण अंधार. त्यामुळं खाली उतरणं थोडं जिकिरीचं ठरतं. समोर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. प्रथम चोैरस अन् मग वर्तुळ यावर तो बसविण्यात आला आहे.नक्षीदार दगडी खांब हे मंदिराचे वैशिष्ट्यं आहे. त्याला विविध आकार देण्यात आले आहेत.
चंदनगड अन् इब्राहिमपूर ही साताऱ्यापासून जेमतेम तासाभरात पोहचता येतील अशी ठिकाणं. अगदी अर्ध्या दिवसातही उरकता येईल अशी ही भटकंती. त्यामुळं वेळ मिळेल तेव्हा आवर्जून वाकडी वाट करायला हरकत नाही!
भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे. जाधव घराण्याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्यापैकी एक वाडा पडला आहे. एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’ असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे. राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव घराण्याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’ असे सांगतात. जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री (समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते. त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक, चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी, जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी, चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत. त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी, बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब, शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी, जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.
जाधवरावांच्या जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती. जाधवराव घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केलेल्या आहेत. त्या घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड इत्यादी राजघराण्यांशी आहेत.
जाधव वाडा- भुईंज
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात. राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला -नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली. या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत .
सोनेश्वर :
बावधन व ओझर्डे गावातील सीमेवर कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वराचे मंदिर आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत साधारण एक हजार वर्षांपूर्वी समाधिस्त झालेल्या अज्ञात सत्पुरुषांची समाधी सन १९७० ते ७५च्या दरम्यान सापडली आहे. सोनेश्वर मंदिरापासून बावधनच्या बगाडाची सुरुवात होते. काळजाचा ठोका चुकविणारे हे बगाड बघण्यासाठी प्रचंड गर्दी होते.
श्री क्षेत्र सोनेश्वर
श्री क्षेत्र सोनेश्वर सनातन धर्माच्या तत्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कली या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृत्ती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर ऱ्हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून जादा पाप होत असते. परंतू साधर्म्य कमी असल्यामुळे कृच्छ-चांद्रायणादि शरीर कष्टाची प्रायच्छिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णा स्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय कृष्णा नदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. या उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णा महात्म्यात सांगितले आहे. विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णूपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्व अधिक आहे.
सोनेश्वर हे जागृत स्वयंभू महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर, बावधन च्या बगाडाच्या संदर्भात महत्वाचे मंदीर आहे. सोनेश्वर बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावरील टेकावर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस नदीच्या दोन्ही तीरावर कजाळाची दाट झाडी असून नदीवर प्रचंड पाण्याचे डोह आहेत. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांनी कृष्णा नदीतील डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरुन या तिर्थक्षेत्राला सोनेश्वर असे नाव पडले असावे. तेव्हा पासून आजपर्यंत या डोहातील पाणी कधीच आटले नाही असे सांगतात. त्याचा तळही कधी सापडला नाही. मंदिर प्रत्यक्ष ओझर्डे गावाच्या हद्दीत, गावच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावर असून हे मंदीर अठराव्या शतकात ओझर्ड्याच्या पिसाळ देशमुख मंडळींनी बांधले आहे. ग्वाल्हेरच्या अनेक धनिकांनी या मंदिरास देणग्या दिल्या आहेत.
मंदीर घोटीव चीऱ्यांनी बांधले असून या पश्चिमाभिमुख मंदिरात शंकराची पिंड आहे. पिंडीवर संततधार पाणी पडत असते. या देवालयासमोर वीस-बावीस फुटावर लहानश्या चौथऱ्यावर चौफेर कमानीत नंदी असून त्याच्या गळ्यातील घंटेत असलेल्या बगाड्याच्या मूर्तीवरून बगाड हे सुमारे ३१३ वर्षांपूर्वीपासून सुरु झाले असावे असे म्हणतात. मंदीर ३१३ वर्षापूर्वी बांधले असतानाच नंदी तयार केला असला पाहिजे. बावधनमध्ये भैरोबाच्या मंदिरात खांबांनाही ठोकलेले नालांचा आकडादेखील यादरम्यानच आहे. या दोन्ही गोष्टींवरून बगाडाची सुरुवात ३१३ वर्षापूर्वी झाली याचा अंदाज बांधता येतो. याच देवालयापासून बगाडाची सुरुवातही होते. बगाड्या सोनेश्वर डोहात स्नान करून विशिष्ट पोषाख घालून नंतरच बगाडाच्या शिडाला टांगतात.
देवालय २६ फूट लांब व १९ फूट रुंद व साडेदहा फूट उंच असे आहे. हे स्थान फार पुरातन असून या स्थानासंबंधाचे महत्त्व श्री कृष्णामहात्म्य मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव हटकेश्वर. हटक म्हणजे सोने यावरून सोनेश्वर हे नाव पडले असावे असे वाटते. गाभारा दहा फूट चौरस आहे. गाभाऱ्याला लागूनच लहानशी पडवी आहे. देवालयासमोर चौथऱ्यावर नंदी आहे व त्यामागे श्री मारुतीराज आहेत.
नित्य नियमाने आरती, रुद्राभिषेक मंत्रोच्चारात केले जातात. श्रावणात व चातुर्मासात शेकडो भक्तगण गुरु चरित्रांचे पारायणे करतात. अनेक ग्राम दैवताच्या पालख्या आणि कावडी नदीत स्नान करुन येथील महादेवाच्या भेटीला येतात. यावेळी सोनेश्वर परिसराला जत्रेचे स्वरुप येते. यावेळी ओझर्डे ग्रामस्थ व दत्त सेवेकरी मंडळा तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.
या देवालयात विश्वनाथ बोवा कर्नाटकी ब्राम्हणाने चाळीस दिवस उपोषित राहून आराधना केली तेव्हा बुवांना दृष्टांत झाला की "या ठिकाणी सेवा करून राहावे". विश्वनाथ बोवानी श्रीगुरुचरित्र हातांनी सुरेख लिहिले आहे. ही हस्तलिखित प्रत देवालयात पूर्वी होती. ते इथे श्री दत्त जयंतीचा उत्साह देखील करीत असत. बुवांचे म्हणण्यात हे स्थान दत्त स्वरूपी आहे. बुवांनी याठिकाणी सुमारे पंचवीस वर्षे काढली. पुढे श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचे बुवांचे मनात आले. म्हणूनच बुवांनी आपले शिष्य काशिनाथपंत केंजळकर यांना "श्री सोनेश्वराची" पूजा वगैरे सर्व व्यवस्था सांगून आपण श्री क्षेत्र काशी येथे गेले. ते तिकडेच वारले. बुवांचे शिष्य काशिनाथपंत केंजळकर कुलकर्णी हे पुढे तिथे राहत. काशिनाथपंत यांनी प्रपंच सोडून बुवांचे व्रत पुढे चालू ठेवले होते.
पूर्वी या मंदिर व परिसरात लोक तपश्चर्येला बसत असत. काही ऋषींनी मंदिरात व परिसरात समाधी घेतली असल्याचे लोक सांगतात. ४० ते ५० वर्षांपूर्वी या ठिकाणी मंदिर परिसरात सपाटीकरण केल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत समाधी घेतलेल्या अवस्थेतील पाच मानवी सांगाडे सापडले होते. दगडी बांधकाम केलेल्या समाध्या सापडल्या आहेत. या समाधीच्या तोंडावर गोल मोठ्या दगडी चाकांच्या आकारांचे झाकण असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. त्यामुळे ते सूर्य उपासक असावेत, असा अंदाज पुरातत्व खात्याने वर्तवला आहे.
केंजळ गावचे हैबतराव जगताप इनामदार यांनी येथे लहानसा घाट व चिदंबरेश्र्वराचे देवालय बांधले आहे. हे पूर्वाभिमूख मंदिर २८ फूट लांब व १८ फूट रुंद असे आहे. दर्शनी तीन कमानीची पडवी आहे. समोर चौथऱ्यावर नंदी आहे. देवालयासमोर एकामागे एक असे दोन मनोरे आहेत. एक अष्टकोनी व दुसरा चौकोनी आहे. हे मनोरे फारच सुरेख बांधले आहेत. श्री चिदंबराची पूजा वगैरे ची व्यवस्था काही नाही.
असेही म्हणतात की पूर्वी ओझर्डे हे गाव पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोनेश्वर तीर्थस्थानाजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेले होते. सूर्याजी पिसाळ यांचे काळात ओझर्डे मधील विद्यमान पद्मावती मंदिरही ओझर्डेच्या पश्चिमेस, सोनेश्वर मंदिरास समांतर अंतरावर होते. नंतर त्यांनी गाव आणि पद्मावती मंदिराची जागा देखील हलविली. पण पूर्वी त्यांची स्मशानभूमी या परिसरात होती. केंजळचे जगताप इनामदार यांनी ही जागा मंदिर व स्मशानभूमीसाठी दिली होती. आता स्मशानसुद्धा त्यांनी हलवले आहे. ओझर्डे ते केंजळ या सरळ रस्त्यांसाठी जगताप इनामदार यांच्या खातर ओझर्डे, पांडे, बोपेगाव, कवठे गावांनी जागा दिल्या आहेत.
येथील घाटावरून पूर्वेस चंदन वंदन किल्ले व दक्षिणेस वैराटगड किल्ला वगैरे देखावा फार प्रेक्षणीय दिसतो. तेथील घाट, देवालय व मनोरे यांच्या योगाने हे स्थान विशेष रमणीय झाले आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी शाळांच्या सहली येतात व भाविकांची गर्दी असते. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच पुरातन ऋषीमुनींच्या तपश्चर्येने आठवणीत राहिलेले श्री क्षेत्र सोनेश्वर सर्वत्र परिचित आहे. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता रुद्रभिषेक व महाप्रसादाचे आयोजन येथील सेवेकरी मंडळा मार्फत केले जाते. श्रावण महिना, महाशिवरात्री या काळात लोकांची दर्शनाला गर्दी झाल्याचे दिसते.
श्री सोनेश्वरापासून नदीपलीकडे कडेगाव आहे. हा गाव मात्र येथून अगदी जवळ आहे. श्री सोनेश्वराचे दक्षिण बाजूस एक कौलारू धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा वाई येथील पूर्वीचे मोहनीराज मामलेदार यांनी वर्गणी जमवून बांधली असे सांगितले जाते.
संदर्भ:- १. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३. २. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११
(अजित आबा पिसाळ, अभिजित पिसाळ (ओझर्डे) यांचे माहिती संकलनातील मदतीसाठी आभार)
वाई-सातारा रस्त्यावर बावधन हद्दीमध्ये साधारण दोन-तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वाकेश्वराचे सुंदर मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. मंदिराला संपूर्ण तटबंदी आहे. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यावर याची शोभा अधिकच वाढते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गाभाऱ्याचे बाहेर असलेला गणपती खूप वेगळा आहे. बारकाईने पाहिले असता लक्षात येते, की या मूर्तीचा शिरोभाग हा इतर मूर्तींप्रमाणे नसून, त्याचा शिरोभाग कथेप्रमाणे हत्तीचे मस्तकारोपण केल्यावर दिसेल तसा दाखविले आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण चालू असते
ऋणनिर्देश: अजित आबा पिसाळ, विलास बापू पिसाळ, कौस्तुभ वैद्य, डॉ मुजुमदार, सदाशिव ननावरे, वैभव कदम, शिवप्रसाद कुलकर्णी, राजू कुलकर्णी वकील, मधुकर जोशी काका, तेजस अरबुणे, अनिकेत पिसाळ पाटील, युवराज पिसाळ पाटील, सोमेश्वर बागल, शिवलिंग क्षीरसागर, विष्णू धेडे, तसेच इतर काही जणांनी माहिती संकलनात बहुमोल सहकार्य केले. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते म्हणून सर्वांचे सहकार्याबद्दल खूप खूप आभार.
वैराटगड :
पुणे-सातारा रस्त्यावर पुण्याहून येताना उजव्या बाजूला पाचवडजवळ हा किल्ला आहे. भुईंजपासूनच हा किल्ला दिसू लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पाचवड-वाई मार्गावर व्याजवडीपासून येथे जाता येते. दुसरा रस्ता पाचवड-मेढा रस्त्यावर सारातले गावातून आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने १२व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. गडावर पूर्वी तटबंदी होती. आदिलशहाकडून शिवरायांनी १६५९च्या सुमारास किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाने इसवी सन १६९९मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे सर्जागड असेही नामकरण झाले होते. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये याचा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. १८९६मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकातही या तटाचे उल्लेख आले आहेत. किल्ल्यावर पुरातन अशी कोणतीही वास्तू अस्तित्वात नाही; मात्र इमारतींचे, वाड्यांचे, जोत्याचे अवशेष दिसून येतात. कातळाची नैसर्गिक तटबंदी किल्ल्याला लाभली आहे. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी बघण्यास मिळतात. कातळावर मधाची पोळी असतात. त्यापासून सावध राहावे. गडावर वैराटेश्वराचे देऊळ आहे. देवळाच्या सभामंडपात उभे केलेले एक वीरगळ शिल्प (स्मारक) दिसते. हा वीरगळ यादव काळातील असावा. योद्ध्याच्या पराक्रमाची माहिती शिल्पपटातून त्यावर कोरलेली असते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे.
सोनजाई मंदिर
सोनजाई मंदिर : वाई शहराच्या दक्षिणेस एक भव्य डोंगर दिसतो. या डोंगरावर सोनजाईचे मंदिर आहे. नवरात्रात या मंदिरामध्ये वाईमधील भाविक पदभ्रमण करीत जातात. दमछाक करणारी वाट असली, तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर सर्व शीण निघून जातो. विवाह समारंभ झाल्यावर अनेक कुटुंबामध्ये नवदाम्पत्याने देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. सोनजाईच्या डोंगरावर दक्षिणेस बावधनपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर दोन बौद्ध लेणी आहेत. ही हऱ्या-रामोशाची गुहा म्हणून ओळखली जाते.
सोनजाई मंदिर :
वाई शहराच्या दक्षिणेस एक भव्य डोंगर दिसतो. या डोंगरावर सोनजाईचे मंदिर आहे. नवरात्रात या मंदिरामध्ये वाईमधील भाविक पदभ्रमण करीत जातात. दमछाक करणारी वाट असली, तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर सर्व शीण निघून जातो. विवाह समारंभ झाल्यावर अनेक कुटुंबामध्ये नवदाम्पत्याने देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. सोनजाईच्या डोंगरावर दक्षिणेस बावधनपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर दोन बौद्ध लेणी आहेत. ही हऱ्या-रामोशाची गुहा म्हणून ओळखली जाते.
पुण्याहून सातार्याला येताना निरानदी ओलांडली की सातार्याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.
केदारेश्वर मंदिर - शिरवळ
शिरवळ गावाच्या शेजारुन दक्षिणोत्तर प्रवाहीत होणारा लहान ओढा निरा नदीस मिळतो. याच ओढ्याच्या एका बाजूला केदारेश्वर मंदिर तर दुसऱ्या बाजूला शिरवळ गाव. पूर्वाभिमुखी मंदिर भव्य घडीव दगडी सुरक्षारक्षक तटबंदीत असलेला परिसर रमणीय आहे. तटबंदीच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर आयताकृती दगडी बांधकामातील जिवंत पाण्याने भरलेली बारव असून तिच्यात उतरण्यासाठी भव्य पायऱ्या दक्षिणेस आहेत,तर पश्चिमेस एका व्यक्तिस उतरता येईल असा काटकोनात असलेला मार्ग आहे. प्रवेशद्वाराच्या तटबंदीला लागूनच दोन्हीही बाजूस भव्य वृक्ष शितल छाया देत उभे आहेत. चारपाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिर प्रारंगणात प्रवेश करतो. समोर घडीव दगडांवर कलाकुसर केलेल्या स्तभांवर विशाल नंदी मंडप असून सामान्यतः स्तंभावर छत व शिखर असते मात्र त्याला हे मंदिर अपवाद आहे कारण छतावर देखील स्तंभ असून त्याच्यावर असलेल्या छतावर कळस आहे. तटबंदीच्या अंतर्गत भागात असलेल्या ओवरीत बसून क्षणभर विसावल्यावर मन नकळतच ऐतिहासिक कालखंडात जाते. या पुरातन मंदिरात इतिहासकाळात अनेक दिव्य, मजहर झालेले आहेत. काही वर्षापूर्वी पुण्यातील इतिहास संशोधकांनी या मंदिरात झालेल्या मजहर ( न्यायनिवाडा) प्रसंगी सरसेनापति प्रतापराव (कुडतोजी) गुजर हजर असलेला ऐतिहासिक कागद शोधून काढला आहे. तर पुणे परगणाच्या नीरथडी तरफेतील मांढर व धनकवडी या गावच्या कुलकर्णी असलेल्या जिवाजी विठ्ठल याने १४ जानेवारी १७१९ हकीकतीत म्हटले आहे की, शिवकाळात धनकवडी गावच्या कुलकर्ण्यवरुन वाद निर्माण झाला होता तेव्हा तंट्याचा न्यायनिवाडा करण्याचे स्थळ शिरवळ हे पुणे परगण्याचे कारकून व देशमुख-देशपांडे यांनी नमुद केले होते. याचा दुसरा अर्थ असा की, शिरवळ म्हणजेच शिरवळ मधील केदारेश्वर मंदिर हे होय. अशाप्रकारे इतिहासात असे अनेक मजहर व दिव्य या मंदिरात झालेले आहेत. ओवरीतून उठून केदारेश्वराच्या दर्शनासाठी जाताना मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला असलेली सुरेख दगडी दीपमाळ आपले ऐतिहासिक अस्तित्व अधोरेखीत करताना दिसते. नंदी दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो.संपूर्ण नक्षीदार दगडी स्तंभावर असलेल्या सभामंडपात पोहोचतो. आधुनिक तेल रंगांचा वापर केल्याने त्याचे पुरातन अकृत्रिम सौंदर्य लोप पावले आहे. त्यानंतर अंतराल भव्य असून आत अतिशय शितल वातावरण अनुभवता येते. गर्भगृह काहीसे खोलगट असून केदारेश्वराच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळते. मंदिर परिसरात विविध मूर्ती आढळून येतात.
लयनगिरी लेण्या:-
ह्या पूर्वाभिमुख असून त्यांची संख्या सात आहे. मात्र आजूबाजूला अनेक अर्धवट खोदकामे आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या लेण्यांमध्ये सभामंडप असून, बौद्ध कालीन स्तूप देखील आहे. स्तूपा समोरच नंतरच्या काळात भगवान श्री महादेवाची पिंड स्थापित केली असण्याची शक्यता आहे. अन्यत्र असलेल्या लेण्यांप्रमाणे येथील लेण्यात शिलालेख, नक्षीकाम किंवा देव देवतांच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या नाहीत. काही लेण्यात लहान लहान स्वतंत्र दालने असून बैठक व्यवस्येसाठी कोरीव खोदकाम करून बैठकीची सोय केलेली प्रामुख्याने दिसून येते.
या लेण्याबाबत कोणत्याही स्थानिकांना माहिती नव्हती कारण त्या मातीने पूर्णपणे भरून गेल्या होत्या, मग इतरांना कशी होणार ? इ. स.१९३५ मध्ये भोर संस्थान अस्तित्वात होते. भोर संस्थानात एकूण ५०२ गावांचा समावेश होता. या सर्व गावांच्या कारभारासाठी भोर संस्थानचे पाच तालुके होते. राजगड तालुका, विचित्रगड तालुका, प्रचंडगड तालुका, पवनमावळ तालुका व सुधागड तालुका अशी त्यांची नावे होती. विचित्रगड तालुक्याचा सर्व कारभार करणारी शासकीय कार्यालये ही शिरवळ या गावी होती. तत्कालीन विचित्रगड तालुक्याच्या मामलेदारांनी या लेण्यांबाबत भोर संस्थानचे तत्कालीन अधिपती राजा रघुनाथराव यांना माहिती दिली. श्रीमंत राजेसाहेबांनी या लेण्यातील माती बाहेर काढून स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. लयनगिरी लेण्यांची साफसफाई झाल्यावर दि.२९ जून १९३६ रोजी श्रीमंत राजेसाहेब स्वतः लेणी पाहण्यासाठी गेले. राजेसाहेबां सोबत बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील प्रसिध्द इतिहासतज्ज्ञ प्रोफेसर अनंत सदाशिव आळतेकर हे देखील होते. ही लेणी बौद्धकालीन असून तिची निर्मिती इ. स.५० ते १५० दरम्यान बौद्ध धर्माचे अध्ययन व अध्यापन यासाठी झाली असल्याचे मत प्रोफेसर आळतेकरांनी व्यक्त केले. राजेसाहेबांनी लेण्यांच्या बाजूला लोखंडी कठडा बसविण्याचे संबंधितांना आदेश दिले. आज मात्र यातील काही दिसून येत नाही.
आपल्या पूर्वजांनी अपार कष्ट करून लेणी कोरली आहेत. त्याचे संवर्धन व प्रचार व्हावा यासाठी पर्यटकांनी अशा ठिकाणांना भेट देणे गरजेचे आहे. लयनगिरी लेण्यांच्या ठिकाणाहून वीर जलाशयाचा विहंगम देखावा दिसतो व तो डोळे भरुन पाहणे हे निसर्गप्रेमींना एक पर्वणीच ठरते. पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य अज्ञात स्थळे सह्याद्रीच्या कुशीत आहेत, या सौदंर्यस्थळांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण, संवर्धन व प्रचार करणे हे आपले कर्तव्य आहे. सह्याद्रीच्या नैसर्गिक व आपल्या पूर्वजांनी अपार मेहनतीने निर्माण केलेल्या सौंदर्याचा आस्वाद प्रत्येकाने घेतला पाहिजे. मग कधी भेट देताय "लयनगिरी"ला?
पुणे ते शिरवळ व सातारा ते शिरवळ अशा परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. शिरवळ गावातील केदारेश्वर मंदिर, सुभानमंगळ किल्ल्याचे अवशेष व इतरही मंदिरे आपण पाहू शकाल. शिरवळ येथे राहण्याची व जेवण्याची सोय होईल.
वाई :
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर. साताऱ्याच्या वायव्येस सु. ३३ किमी. व पुण्याच्या आग्नेयीस सु. ८८ किमी.वर ते कृष्णा नदीकाठी वसले आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून त्याची प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांत गणना करतात. वाईचे नाव उच्चारले, तरी आपल्या डोळ्यासमोर कृष्णामाईचा घाट आणि त्यासभोवतालचा परिसर डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित असलेल्या वाईला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि तो ठेवा वाईकरांनी अजूनही मोठ्या निष्ठेने जपला आहे. वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ञांत मतैक्य नाही तथापि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून वाई हे नाव पडले असावे, असे मत व्यक्त करतात. स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षेत्र’ असा उल्लेख आढळतो. ‘विराटनगर’ या नावानेही हे परिचित आहे.
वाईचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही परंतु येथील किवरा ओढ्याच्या (कीचक विहिरीच्या) परिसरात सापडलेली क्षुद्राश्म हत्यारे प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवितात. पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत सापडलेल्या सातवाहनकालीन अवशेषांवरून वाई हे सातवाहन राजांच्या अंमलाखाली (इ. स. पू. २००-इ.स. २०३) असावे. वाईच्या ईशान्येस सहा किमी.वर लोहारे गावाजवळ हीनयान बौद्धांच्या आठ गुहा आहेत.त्यानंतरच्या बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास अस्पष्ट आहे. वाईच्या परिसरातील पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन इ. डोंगरी किल्ले हे शिलाहारांनी (९००-१३००) बांधलेले आहेत. त्यावरून या प्रदेशावर शिलाहारांचे आधिपत्य असावे, असे इतिहासज्ञांचे मत आहे. १३९६ ते १४०८ या बारा वर्षात दुष्काळामुळे वाईची वस्ती उठून गाव ओस पडले होते. तेव्हा बीदरचा बहमनी सुलतान पहिला अहमदशाह वली (कार. १४२२-३६) याने मलिक-उत्-तुज्जार खलफ हसन यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने वाई परिसरातील किल्ले घेऊन येथे वस्ती करण्याचे काम दादा नरसो व एक तुर्की खोजा यांवर सोपविले (१४२९). बहमनींचे लष्करी ठाणे वाई येथे होते. महमूद गावानच्या कोकणातील स्वारीत (१४६९) वायदेशातील काही शिपाई होते, नंतर वाई आदिलशाहीकडे गेले. आदिलशाहीचा सरदार अफझलखान १६४९-५९ यांदरम्यान येथे सुभेदार होता. त्याच्या वाड्याचा काही भाग (तटबंदी, बुरूज इ.) अवशिष्ट असून सतराव्या शतकातील दोन मशिदी अद्यापही सुस्थितीत आढळतात. प्रतापगडाच्या युद्धात अफझलखानाचा वध झाल्यानंतर (१६५९) वाई हे काही काळ मराठ्यांच्या अंमलाखाली होते तथापि मराठ्यांना वाईवर सलग ताबा ठेवता आला नाही. अफझलखानानंतर येथे सय्यद इलियास शर्झाखान याची सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. छ. शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा प्रदेश पूर्णतः जिंकून येसाजी मल्हार यास येथे सुभेदार नेमले. अफझलखानाच्या वधापासूनच वाईमध्ये कृष्णाबाई उत्सवाची परंपरा आहे, असे मानले जाते. संभाजीच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. या काळात शर्झाखानबरोबरच्या युद्धात (१६८७) सेनापती हंबीरराव मोहिते वाईजवळच केंजळ परिसरात मारले गेले. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर १६८९ वाईवर मुघलांनी हल्ला केला व वाई मोगलांच्या ताब्यात गेले. संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मोगलांबरोबर लढा देऊन पुन्हा वाई काबीज करून तेथे मराठ्यांचे ठाणे केले. छ. शाहूंच्या वेळी (कार. १७०७-४९) वाईवर सुरुवातीस मोगल व मराठे असा दुतर्फी अंमल होता. सन १७०८मध्ये छत्रपती शाहू महाराज सुटून आल्यावर वाई येथील शेखमिरे यांनी त्यांना मदत केली. हे लक्षात ठेवून शाहू महाराजांनी शेखमिरे यांना पसरणी गाव इनाम दिला. याच वेळी रामजी दामोदर गाडगीळ व भिकाजी शामजी रास्ते हे शाहू महाराजांच्या विश्वासातील सरदार वाईत आले. साताऱ्यातील एक सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी बाळाजी बाजीरावास आपली मुलगी गोपिकाबाई दिली आणि रास्ते घराण्याचे पेशवे दरबारी वजन वाढले. परिणामतः पेशव्यांनी रास्त्यांना १५ लाखांचा सरंजाम दिला. त्यामुळे रास्ते हे उत्तर पेशवाईत (१७६१-१८१८) वाईत स्थायिक झाले आणि जवळजवळ अनभिषिक्त राजे बनले. त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला. रास्ते व त्यांचे आश्रित यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले, उमामहेश्वर (पंचायतन), महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर, इ. सुरेख मंदिरे उभारली, वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना केली.
सन १८१८मध्ये ब्रिटिश आले. पाच डिसेंबर १८५५ रोजी वाई नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. सन १८७४मध्ये नगरपालिकेची हद्द ठरविण्यात आली. नगरपालिकेचे पदसिद्ध अध्यक्ष कलेक्टर असत. सन १८८५पासून निवडणूक होऊन आठ सदस्य घेतले जात व आठ सदस्य नियुक्त असत. अध्यक्ष कलेक्टर असत; मात्र मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन निवडून आलेल्या सदस्यातून होत असत. त्याप्रमाणे पहिले चेअरमन महादेव अप्पाजी साठे झाले. सन १९१०मध्ये निवडून आलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडून देण्याचा अधिकार मिळाला व शंकर महादेव पाटणकर पहिले नगराध्यक्ष झाले.
वाईच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा होता व ज्यांनी वाईचे नाव उंचावले ते म्हणजे प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांची ही कर्मभूमी. स्वामी केवलानंद उर्फ नारायणशास्त्री मराठे, विचारवंत रा. ना. चव्हाण, पद्मश्री यमुनाबाई वाईकर, कविवर्य द. वि. केसकर (घरात हसरे तारे), कविवर्य रवींद्र भट, शाहीर साबळे, उद्योगपती बी. जी. शिर्के, व्ही. एम जोग, पहिलवान गणपतसिंग डाळवाले (परदेशी), पहिलवान शंकरराव घाडगे, वाईनगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब भावे, डॉ. प्र. श. मराठे, रामभाऊ मेरुरकर, शंकरराव जेजुरीकर, भाऊ धोंगडे, मैनाताई नित्सुरे (कलावृंद संस्था), काशीताई नातू, आत्माराम नाईकवडी अशा अनेक दिग्गजांची नावे घेता येतील. योगीराज अरविंद वाई येथील लेलेशास्त्री च्याकडे योगाभ्यास शिकण्यासाठी येत असत. लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय व्यवसाय सोडून कीर्तनाद्वारे राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचे कार्य करणारे व सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देणारे डॉ. पटवर्धनबुवा आता कोणालाच माहीत नाहीत. महात्मा गांधींनी बेळगाव येथे त्यांचे ‘वंदे मातरम्’ ऐकले आणि पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाऊशास्त्री लेले हे विद्वान पंडित होऊन गेले. ते शास्त्र लेखक होते. अत्यंत फटकळ असलेल्या लेलेशास्त्रींबद्दल आचार्य अत्रे म्हणायचे, की त्यांच्याकडूनच ते आक्रमक भाषण करण्याची पद्धत शिकले.
हा झाला वाई शहराचा इतिहास.आज वाईत, लहान- मोठी अशी शंभराहून अधिक मंदिरे आहेत. त्यांतील कृष्णा पुलाजवळची महादेव, दत्तात्रेय, दक्षिणकाठचे सिद्धश्वेर इ. काही मंदिरे एकोणिसाव्या शतकातील असून हरिहरेश्वर, अंबाबाई (महाकाली), रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा (मारुती), वाकेश्वर, गणपती (साबणे) ही पूर्व-पेशवाईतील मंदिरे आहेत. त्यांच्या चुनेगच्चीतील शिखरांचे बांधकाम मात्र पेशवाईत झाले असावे. या जुन्या मंदिरांतून काही पाषाणशिल्पे आढळतात. तद्वतच मंदिरांतील प्रतिष्ठापित मूर्तीतील काही मूर्ती, विशेषतः महालक्ष्मी, विष्णू, विठ्ठल-रखुमाई, महागणपती, महाकाली, त्रिमुखी दत्तात्रेय, गोशाळेतील संगमरवरी कृष्णमूर्ती, काशीविश्वेश्वर मंदिरातील घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नदी व गर्भगृहाची कलाकुसरयुक्त द्वारशाखा ही लक्षणीय आ चित्तवेधक आहेत. महालक्ष्मी, विष्णू, काशीविश्वेश्वर, महागणपती, उमामहेश्वर, इ. मंदिरे एका विशिष्ट मराठा वास्तुशैलीत (नव-यादव) बांधलेली आहेत. या मंदिरांचे विधान चतुरस्त्र असून त्यांत गर्भगृह, सभामंडप, क्वचित अंतरालय आढळते. शिखरांवरील कोनाड्यांत चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे.
गोशाळे रास्तेवाडा, विद्यमान शासकीय मुद्रणालय (मुख्यतः विश्वकोश छपाईकरिता), नगरपालिका, मोतीबाग, इ. रास्त्यांनी बांधलेले वाडे चौसोपी, प्रशस्त आहेत. वाईच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या मोतीबागेतील वाडा आनंदराव रास्त्यांनी विश्रामधाम म्हणून बांधला. त्यातील पोहण्याची खास विहीर, बाग, कारंजी, पाणी ओढण्यासाठी वैशिष्ट्यूपूर्ण रहाटगाडगे इ. अवशिष्टआहेत. या वाड्यातील दिवाणखान्याच्या भिंती भित्तिचित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. पेशवाईतील वाडा हा एक स्वतंत्र वास्तु-विषय आहे कारण कार्यानुरूप आकारनिर्मित, भक्कम बांधकाम, सूक्ष्म कलाकुसर, छायाप्रकाशाचे कार्यानुरूप इ. वैशिष्ट्ये यात आढळतात.
वाई अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्याच्या खुणा आजही जागोजागी पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईपासून केवळ सहा किलोमीटरवरील मेणवलीचा घाट प्रसिद्ध आहे.
मराठाकालीन अवशिष्ट भित्तिचित्रांत कदाचित वाईचा पहिला क्रमांक लागेल. या चित्रांचा काळ साधारणतः १७३० ते १८५४ असा वास्तूंच्या बांधणीवरून ठरविता येईल. भाव्यांच्या कोटेश्वर मंदिरातील भित्तिचित्रे ही अखेरची कलाकृती होय. मोतीबाग, पटवर्धन वाडा, जोशी (मेणवलीकर) वाडा, शासकीय मुद्रणालय इत्यादींतून भित्तिचित्रे अवशिष्ट असून जवळच मेणवली येथील नाना फडणीस वाडा व मेणेश्वर मंदिर यांतून भित्तिचित्रे आहेत. या भित्तिचित्रांत वैष्णव धर्माचा प्रभाव अधिक दिसतो. रंगसंगती, विषयांतील वैविध्य आणि रेषांचे लालित्य यांमुळे ही भित्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. चुनेगच्चीतील मूर्तिकाम आणि भित्तिचित्रांतील प्रतिमा यांतून तत्कालीन मराठमोळी संस्कृती दृग्गोचर होते.
कृष्णेचा उत्सव हे वाईचे खास वैशिष्ट्य . हे उत्सव सात घाटांवर साजरे होतात. छ. शिवाजी महाराजांच्या वेळी यास प्रारंभ झाला असावा, अशी समजूत आहे. या उत्सवांप्रमाणेच प्रत्येक वाडी व काही पेठा यांच्या वार्षिक यात्रा भरतात. मध्ययुगापासून वाई हे वेदविद्येचे व संस्कृत भाषेच्या अध्ययन-अभ्यासाचे प्रसिद्ध केंद्र समजले जात होते. विष्णुशास्त्री ग. जोशी व दत्तात्रेय जोशी (मेणवलीकर), बाळंभट रानडे, का. वा. ऊर्फ भाऊशास्त्री लेले, गोरक्षक चौंडे महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धनबुवा, बाळशास्त्री डेगवेकर, केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) इ. विद्वान मंडळींचे येथे वास्तव्य होते. शहरात प्राज्ञपाठशाळा, चौंडे महाराजांनी स्थापिलेली श्री गोवर्धन संस्था (गोशाळा), लो . टिळक स्मारक ग्रंथालय, वाई व्यायामशाळा, ब्राह्मो समाज, वाई अक्षर इन्स्टिट्यूट या प्रसिद्ध जुन्या -नव्या संस्था आहेत. येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विद्यमाने मराठी विश्वकोशरचनेचे काम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली १९६२ पासून चालू आहे. एकोणीसाव्या शतकात मोदवृत्त, मधुवृत्त, वृत्तसार, इ. वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होत होती. मकरंद हे मासिक काही वर्षे चालू होते. त्याच्या स्मरणार्थ मकरंद प्रतिष्ठान स्थान झाले असून त्याच्या तर्फे दरवर्षी उत्तम पत्रकारितेबद्दल पुरस्कार देण्यात येतात. सांप्रत तांबडी माती, ज्ञानकिरण ही साप्ताहिके आणि नवभारत हे मासिक येथून प्रसिद्ध होते. वाईची नगरपालिका (स्था. १८५६) आरोग्य, पाणीपुरवठा, साफसफाई इ. नागरी सुविधा पुरविते. शहरात शासकीय रुग्णालय व ग्रामीण आरोग्य केंद्र असून अनेक खाजगी दवाखाने व रुग्णालये आहेत. त्यांपैकी ‘मिशन हॉस्पिटल’ हे सर्वांत जुने असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहरात सहा माध्यमिक विद्यालये (एक इंग्रजी माध्यमाचे) असून विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखांचे एक महाविद्यालय आहे. कृषि-उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचे हळद, गूळ व धान्य यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. दर सोमवारी बाजार भरतो. शहरात सात बँका असून तालुका पातळीवरील सर्व कार्यालये आहेत. याच्या परिसरात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे चालविण्यात येणारे रेशीम उत्पादन केंद्र असून सहकारी सूतगिरणी आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत हे दोन संकल्पित प्रकल्प आहेत. वाईतील मंदिरे, फुलेनगरचे बगाड व वाईच्या परिसरातील डोंगरावरील सोनजाई देवी, मेणवली (नाना फडणीसांचा वाडा, कृष्णेवरील घाट, मेणेश्वराचे मंदिर, पोर्तुगीज बनावटीची भव्य घंटा इ.) भोगाव येथील वामन पंडितांची समाधी, धोम, (धरण व नरसिंह मंदिर), बावधन (भैरवनाथाचे मंदिर, पांडवलेणी व बगाड यात्रा), मांढरदेवी (काळूबाई मंदिर व पौष पौर्णिमेची प्रसिद्ध यात्रा), भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, अंबाडखिंड (वाई-भोर रस्त्यावरील), किकली (भैरवनाथ-यादवकालीन प्राचीन कलाकुसरयुक्त शंकराचे मंदिर) ही प्रसिद्ध स्थाने पर्यटकांची खास आकर्षणे होत .
ढोल्या गणपतीच्या कुशीत अन पसरणी घाटाच्या मुशीत वसलेलं एक निसर्गसंपन्न टुमदार शहर असलेलं वाई म्हणजे पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी आवडत ठिकाणच. शिवपूर्वकाळापासून ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामापर्यंतच्या इतिहासाची स्मृती गाठीशी बांधलेलं हे शहर. पेशवे सरदार रास्ते यांनी उभारलेलं ढोल्या गणपतीच्या देऊळामुळे वाईची ख्याती जनमानसांत पसरलली आहे. त्यापुढे जाऊन येथील पेशवेकालीन घाट, वाडे किंवा तत्सम वास्तूंमुळे इतिहासप्रेमींच्या तसेच स्थापत्यशैलीचा अभ्यास करणाऱ्यांच्या ताईत असलेलं हे ठिकाण. अलीकडच्या दहा पंधरा वर्षात तर बॉलिवुडचे आवडते शूटिंग लोकेशन म्हणून वाईचा उल्लेख होऊ लागला आहे.
ढोल्या गणपती :- वाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. हे मंदिर सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ साली कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. त्यामुळे तो गणपती घाट म्हणून ओळखला जाऊ लागला.
मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होते व मंदिर सुरक्षित राहते. कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर गेली २५७ वर्षे महापुराला तोंड देत उभे आहे. याचे बांधकाम पुराच्या धोक्याचा विचार करूनच केले आहे.देवळाच्या सभामंडपावर घडीव दगडाचे छत असून, शिखर ७५ फूट उंच आहे. १२ फूट आठ इंच X ११ फूट ११ इंच चौथऱ्यावर श्री महागणपतीची सात फूट सहा इंच उंचीची मूर्ती विराजमान आहे.
गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला ‘ढोल्या गणपती’ असे नामाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. गणपतीच्या हातात मोदक, परशू, पळी व दात आहेत. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तु शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे.
या मंदिराचे बांधकाम 1762 मध्ये झाले. गणपतीचा प्रतिष्ठापना दिन म्हणून वैशाख शुद्ध त्रयोदशी हा दिवस वाईमध्ये उत्साहात साजरा करतात. त्याप्रमाणेच संकष्ट चतुर्थी, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीपासून सात दिवस आणि माघी गणेश जयंती उत्सवप्रसंगी श्रीगणपतीची अलंकारयुक्त विशेष पूजा करतात. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची उंची पायथ्यापासून कळसापर्यंतची चोवीस मीटर आहे.
गणपती घाटावर श्री गंगारामेश्वर मंदिर व भावेश्वर मंदिरही आहे. गणपतीमंदिरासमोरच वसंत व्याख्यानमाला भरत असते. गणपती मंदिरासमोरच काशी-विश्वेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला संपूर्ण १४ फूट सहा इंच उंचीची तटबंदी असून, देवळाचे प्रांगण ९४ फूट रुंद व १६१ फूट लांब आहे. बाजूने धर्मशाळा आणि मधोमध पूर्वाभिमुख घडीव दगडाचे मंदिर असून, देवळाच्या गाभाऱ्याची दगडी चौकट व नक्षीकाम सुरेख आहे. एक मोठी घंटा येथे आहे. एक जाळीदार नक्षी असून, त्यावर नागाचे कोडे आहे. समोर सुबक असा ग्रॅनाइटमधील नंदी, त्याच्या पुढे यज्ञशाळा व २३ फूट उंचीच्या दीपमाळा आहेत. महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनाला आलेले हजारो पर्यटक वाईत येउन न चुकता गणेशाचे दर्शन घेतात. त्यामुळे तेथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते.
काशीविश्वेश्वर दीपमाळ आणि यज्ञमंडप काशीविश्वेश्वर मंदिरासमोर गोविंद रामेश्वराचे मंदिर आहे. याच पेठेत वाई नगरपालिकेचे कार्यालय आहे. येथे पूर्वी रास्ते यांचा भव्य वाडा होता. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. येथून पुढे सरळ उत्तरेस गेल्यावर गावाच्या बाहेरच्या बाजूला मोतीबाग हा रास्ते यांचा पेशवेकालीन वाडा आहे.
मोतीबाग रास्तेवाडा गणपती घाटाच्या पुढे धर्मपुरी घाट आहे. या घाटाला ‘रवीधुंडीघाट’ म्हणतात. येथेही श्री कृष्णाबाई उत्सव साजरा होतो. या घाटाला लागूनच १०० वर्षांपूर्वीचा पूल आहे. येथे रामेश्वराचे मंदिर असून, त्याच्या बाजूने कुंडे आहेत. उत्तर बाजूला धर्मशाळेला लागून श्री हरिहरेश्वर मंदिर असून, यालाही तटबंदी आहे. समोर त्रिमुखी दत्तमंदिर व बाजूला मारुती असून, खालील बाजूस नागोबाचा चौथरा आहे.
उत्तम मंदिरे वाईमधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे. धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.
या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडवितात. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहचू शकतो.
बहिरोबा मंदिर, गंगापुरी
स्कंदपुराणांतर्गत कृष्णमहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षत्र’ असा उल्लेख आढळतो. कै. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाई शब्दाची उकल करताना ‘वाय देश म्हणजे कोष्ट्यांचा विणकारांचा देश’ असा अर्थ सांगितला आहे. वाईचा संदर्भ सन ११००च्या सुमारास शिलाहार राजांपासून असला, तरी वाईच्या आसपास बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत. साधारण इ. स. २०० ते ३००च्या दरम्यान सातवाहन काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी. इ. स. ११००च्या सुमारास केंजळगड व पांडवगड शिलाहारांनी बांधले आहेत. सह्याद्री पर्वताची एक शाखा जांभळी, रायरेश्वरापासून शिखर शिंगणापूरपर्यंत आहे. हाच महादेवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. याच डोंगरावर रायरेश्वर, केंजळगड, पांडवगड, मांढरदेवी, शिलाहारांनी बांधलेले वारुगड, संतोषगड व शेवटी यादवराजे सिंधणदेव याने वसविलेले शिखर शिंगणापूर आहे. याच डोंगराच्या दक्षिणेस कृष्णेच्या तीरावर टुमदार, सांस्कृतिक परंपरेचे वाई हे गाव वसले आहे.
मेणवली वेस नदीवर बांधलेल्या घाटामुळे वाईचे सौंदर्य वाढले. त्यावर असलेल्या देवालयांमुळे वाईला ‘दक्षिण काशी’ असे संबोधले जाऊ लागले. रास्त्यांनी गंगापुरी ही नवी पेठ वसविली. विशेष म्हणजे या पेठेतील दक्षिणोत्तर समांतर असलेले रस्ते चार ठिकाणी काटकोनात छेदतात. जणू काही ते नगररचनाकाराने प्लॅन केल्याप्रमाणे वाटतात. गंगापुरीमध्ये येण्यासाठी नदीच्या बाजूने तीन वेशी आहेत. पश्चिमेला धोमकडे जाणारी मेणवली वेस, उत्तर-पश्चिम बाजूची खांबोळा वेस, बेलबाग वेस आणि मधल्या आळीमधील धर्मशाळेजवळील (कृष्णेश्वर कार्यालय) वेस अशा वेशी रास्त्यांनी बांधल्या.
गंगापुरी घाट
गंगापुरी घाट हा सर्वांत मोठा घाट आहे. त्याची लांबी ३७५ फूट असून, रुंदी ५० फूट आहे. हा घाट संपूर्ण दगडी आहे. पुढे नदीचे विस्तीर्ण पात्र, दक्षिणेला सुंदर झाडी. या घाटाच्या पश्चिमेला दुसरे बाजीराव यांचा ८० फूट रुंदीचा घाट असून, येथे छोटासा डोह होता. वरच्या चौथऱ्यावर वडाचे नदीवर ओणवे झालेले एक मोठे झाड होते. मी येथे पोहण्यास शिकलो. या घाटाच्या वरच्या बाजूला गंगाधर रास्ते यांनी बांधलेला गढीसारखा वाडा असून, त्याला बुरुजही आहेत. या वाड्यात कोर्ट होते. १९४२मध्ये हा वाडा भस्मसात झाला. तेथे आता शासकीय मुद्रणालय आहे. वाड्याच्या दक्षिणेस नदीच्या काठावरच राम मंदिर आहे. मोठ्या घाटाच्या पूर्वेस जेथे उत्सव होतो, तो भानू घाट असून, नदीच्या काठावर दोन बुरुजही बांधले आहेत. येथे केवलानंद सरस्वती राहायचे. भानू घाटाच्या उत्तरेस ८२ फूट लांब व ५३ फूट रुंद बांधीव पटांगण असून, येथेच कृष्णाबाईचा उत्सव होतो. त्याच्या पलीकडे भाऊ जोशी यांचा घाट आणि त्याला लागूनच अनगळ वेस आहे. पलीकडे प्राज्ञ पाठशाळेची इमारत दिसते. भानू घाटाला लागूनच उमामहेश्वराचे पंचायतन मंदिर आहे. त्याच्या पूर्वेस भानू वाडा आहे. हे भानू नाना फडणवीसांचे भाऊबंध होते. गंगापुरीत मेणवली वेशीच्या उजवीकडे द्वारका मंदिर आहे. येथे वेदमूर्ती गद्रे यांनी द्वारकेहून आणलेली श्रीकृष्णाची सुरेख मूर्ती आहे. म्हणून याचे नाव ‘द्वारका’ पडले. जवळच गंगाधर रास्ते यांनी बांधलेले ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर असून, आता ते संपूर्णपणे लोकसहभागातून नव्याने आकर्षक पद्धतीने बांधले आहे. मधल्या आळीमध्ये (सत्यपुरी) नदीच्या काठावर पाडळीच्या गाडगीळांनी सुमारे ४० फूट रुंद व १०० लांबीचा कटिंजन घाट बांधला. येथे काही मंदिरे व स्नानसंध्येसाठी इमारत आहे. घाटाकडून वर आल्यावर पट्टाधीश रामाचे मंदिर असून, फक्त गाभारा शिल्लक आहे; मात्र या मंदिरातील राममूर्ती अतिशय देखणी आहे. मधल्या आळीमध्ये हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेची कन्याशाळा आहे. हा मूळचा द्रविड वाडा. येथील कार्यालयातील तख्तपोशी अतिशय सुंदर आहे. गणपती मंदिर घाट विष्णु-लक्ष्मी व्यंकटेश्वर मंदिर
हरिहरेश्वर मंदिरासमोरील रस्ता किसन वीर चौकात जातो. किसन वीर हे यशवंतराव चव्हाण यांचे स्नेही व क्रांतिकारक होते. त्यांच्या स्मरणार्थ या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्याहून वरच्या बाजूस बाजारपेठ असून येथे व्यंकटेश्वराचे (व्यंकोबा) मंदिर आहे. श्रीमती नरगुंदे यांनी बांधलेले हे मंदिर छोटे असले, तरी जुन्या वळणाचे आणि सुंदर आहे व्यंकटेशाची सुंदर मूर्ती येथे आहे. व्यंकटेश मंदिराच्या थोड्या वरच्या बाजूस श्रीराम मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर विष्णुलक्ष्मी व श्री लक्ष्मी मंदिर आहे.
विष्णूच्या मंदिरातील गरुड विष्णूचे मंदिर :
हे वाईमधील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. संपूर्ण मंदिर मोठ्या घडीव दगडात असून, ११ सुरेख कमानींचा सभामंडप आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी बांधले. यात श्री विष्णू व श्री लक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेला गरूड आकर्षक आहे. त्याच्या पायामध्ये सर्पही दिसतो. गणपती मंदिरासमोरील सभामंडपाला आहे, तसे याचे छत दगडी होते. साधारण ५०च्या दशकात एका दुपारी ते कोसळले. प्रचंड आवाज झाला; पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही. लक्ष्मी मंदिर :
पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर घडीव पाषाणात बांधले आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८मध्ये बांधले. कलशाच्या आकाराचे याचे शिखर ५० फूट उंच आहे, तर मंदिराभोवती तटबंदी आहे. याचे खांब घोटीव व कोरलेले आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पाच स्तंभ असून, निमुळत्या असलेल्या छतामुळे त्याला गुहेसारखा आकार आलेला आहे. मराठा स्थापत्यशैलीतील मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवर नक्षीकाम दिसून येते. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर केलेला दिसून येतो. लक्ष्मी यंत्रासारखी शिखराची रचना करण्यात आली आहे. गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीची ढाल, तलवार आदी आयुधे धारण केलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडविते. देवीची पूजा, उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्या दृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे आवाज ध्वनिक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत पोहोचू शकतो.
सिद्धेश्वर मंदिर पुढे सरळ रस्त्याने धर्मपुरी पेठेतून उत्तरेला गेले, की पागा आहे. आता येथे मैदान व प्राथमिक शाळा आहे. येथे रास्त्यांची घोडे ठेवायची पागा होती. येथे मंडळाची तालीमही आहे. धर्मपुरीची १५ एकर जागा आनंदराव रास्ते यांनी शाहसुल हसन शहामीर शहा, कासमशाह व इतर भाऊ यांच्याकडून पाच हजार रुपयांना घेतली व तसा दस्तही करून दिला. या जागेवरच रास्त्यांनी ४८ घरे दान म्हणून ब्राह्मणांना दिली. म्हणून या पेठेस धर्मपुरी हे नाव पडले. धर्मपुरीच्या पलीकडील पेठ म्हणजे ब्राह्मणशाही. हे मूळ वाईचे गावठाण होय. ब्राह्मणशाहीच्या घाटावर चक्रेश्वराचे, चिमणेश्वराचे, मारुतीचे, काळेश्वराचे व कौंतेश्वराचे मंदिर आहे. घाटाला लागूनच पंतसचिव यांचे विठ्ठल मंदिर आहे. याच्या पुढे रामडोह आळीचा घाट असून, येथे रामेश्वराचे मंदिर आहे. येथे कन्यागतामध्ये १२ वर्षांनी गंगा येते, अशी श्रद्धा आहे. याच्या पुढे भीमकुंड घाट आहे. येथे जवळ स्मशान असल्याने उत्सव येथे न होता कोठावळे यांच्या घरात होतो. अश्या तऱ्हेने सात घाटांवर कृष्णाबाईचे उत्सव साजरे होतात.
रोकडोबा मारुती कृष्णा नदीच्या दक्षिण तीरावर सोनगीरवाडी व सिद्धनाथवाडी हे दोन भाग आहेत. सिद्धेश्वराच्या देवळावरून सिद्धनाथवाडी हे नाव पडले. कृष्णा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे हेमाडपंती शैलीतील ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. त्याच्या पलीकडे श्री रामदास स्वामी यांनी स्थापना केलेले मारुतीचे मंदिर (रोकडोबा) आहे. सिद्धनाथवाडीतून पुढे एस. टी. स्टँडच्या पलीकडे महाबळेश्वर रस्त्यावर श्री दत्त मंदिर आहे. येथे वाईतील जुन्या पिढीतील काँग्रेस कार्यकर्ते काका देवधर यांचे निवासस्थान आहे. त्याला लागूनच चौंडे महाराज यांनी स्थापन केलेली गोशाळा आहे. गोवर्धन संस्थागोवर्धन संस्था मुरलीधर मंदिर, गोशाळा
गोवर्धन संस्था : सन १९०५मध्ये चौंडे महाराज यांनी या संस्थेची स्थापना केली. गोवर्धन संस्था पूर्वी मथुरापुरी येथे होती. या ठिकाणी महात्मा गांधी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मदनमोहन मालवीय, वल्लभभाई पटेल, सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बापूजी अणे अशा अनेक विभूतींनी भेट दिली आहे. मंदिराचा परिसर चौंडे यांच्या वारसदारांनी स्वच्छ ठेवला आहे. ग्रंथालयामध्ये गोपालन/संवर्धन या बाबतीतील ग्रंथ आहेत. मंदिरात श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती आहे. मागील बाजूस गाईंचे गोठे व गोबरगॅस निर्मिती वगैरे प्रकल्प आहेत.
प्राज्ञ पाठशाळा :
विजयादशमीस (सहा ऑक्टोबर १९१६) केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांनी, तसेच दिनकरशास्त्री कानडे, गंगाधरशास्त्री सोहोनी, महादेवशास्त्री दिवेकर व भालचंद्रशास्त्री नेने यांनी प्राज्ञ पाठशाळा स्थापन केली. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास व वेदशास्त्रसंपन्न पंडित तयार करणे हा त्यामागचा हेतू होता. केवलानंद स्वामींच्या निवृत्तीनंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संस्थेची धुरा सांभाळली. पाठशाळेच्या पुढील भागात स्वामींची समाधी होती. तेथेच भव्य वास्तू उभारण्यात आली. सध्या तेथे मराठी विश्वकोशाचे कार्यालय आहे. तळघरात स्वामींची समाधी आहे.
वाई हे प्रचीन काळापासून अत्यंत पवित्र समजले गेलेले क्षेत्र आहे. येथे प्राचीन काळी पांडव वनवासात रहात असत. भीमाने येथे कीचकास ठार मारले अशी कथा आहे.
येत्रे पुष्कळ घाट व देवळे आहेत. गंगापुरीच्या घाटापैकी पहिला दोनशे फुटांचा भाग गंगाधरराव रास्तयांनी 1789 मधे बांधला. याला भाऊ जोशी यांनी आणखी 76 फुटाची व दुसर्या बाजीरावाने ऐंशी फुटाची जोड दिली. जवळच गंगापुरी वाडा व उमामहेश्वर पंचायतानाचे देऊळ आहे. हे देऊळही रास्त्यांनी 1784 मध्ये बांधले. या मंदिराच्या चारी कोपर्यात विष्णु, लक्ष्मी, गणपती व सुर्याची मंदिरे आहेत. गंगारामेश्वराचे मंदिरही रास्त्यानी 1780 मधे बांधले. जवळच ढाकळेश्वर महादेवाचे देऊळ आहे. त्याच्यापुढे एक मोठा नंदी आहे. गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 साली 1,60,000/- खर्चून गणपतीचे प्रचंड देऊळ बांधले. जवळचा घाट गणपतरावांचा भाऊ आनंदराव भिकाजी रास्ते यांनी बांधला. गणपतीच्या देवळाची उंची सत्तर फूट आहे. सर्व देवळात उत्तम असे काशी विश्वेश्वराचे मंदिर आनंदराव रास्त्यानी 1757 मधे बांधले. या व अन्य काही देवळांवर मुसलमानी शिल्पांचा प्रभाव आहे. या देवळातील नंदीच्या गळ्यातील घंटा व फुले प्रेक्षणीय आहेत.
मंडईच्या पूर्वेला महालक्ष्मी मंदिर आनंदराव रास्त्यांनी 2,75,630 रू. खचे करून 1778 मधे बांधले. याच रास्त्यांनी 1774 मधे 2,16, 250 खर्चून विष्णु मंदिर बांधले. 1740 ते 1854 ज्या दरम्यान महादेवाची आठ मंदिरे बांधण्यात आली. 1785 मधे आनंदराव रास्त्यांनी बाधलेल्या घाटावर व्यंकोबा बाबाने 1861 साली एक दत्त मंदिर बांधले. भोरकरांच्या पणजीने ताईसाहेबांनी विठोबाचे देऊळ बांधले.
1789 मधे आनंदराव रास्त्यांनी मोतीबाग हा महत्वाचा वाडा बांधला. या वाड्यात सुरेख चित्रे होती. पेशव्यांनी कृष्णेच्या दुसऱ्या तीरावर जाण्यास एक पूल बांधला होता.
समर्थांनी येथे रोकडोबा मारूती येथे स्थापन केला.
वाईच्या दक्षिणेस अफजलखानाने ब्राह्मणाना वेठीला धरून आपला वाडाडा बांधला. एका बाजूला कृष्णा नदी व दोन बाजूनी ओढे अशा रितीने वाड्याच्या तिन्ही बाजूनी पाणी होते. वाड्याचा दगड किकलीतले देऊळ उद्ध्वस्त करून आणला होता.
1429 मधे दौलताबादच्या मालिक उत् तुजार नावाच्या बहामश्री सरदाराने रामोशी आणि खटावचे बंंडखोरांचा पराभव करून वाई घेतली. 1453 ते 1480च्या दरम्यान वाई बहामनी राज्याचे महत्वाचे लष्करी ठाणे होते.
1648 मधे अफजलखान हा विजापूरचा सुभेदार म्हणून येथे अंमल गाजवित होता. वध होण्यापूर्वी अफजलखानाचा सेनेसह येथे मुक्काम होता. अफजलखान वधानंतर वाई मराठ्याच्या ताब्यात आली.
1687 मधे विजापूरच्या शारजाखानाने वाईवर हल्ला केला. तेव्हा हंबीरराव मोहित्यांनी त्याचा पराभव केला, पण या लढाईत मोहिते मात्र मारले गेले. 1690 साली राजारामाच्या कारकीर्दीत पुन्हा वाई जिंकली. कापशीच्या घोरपडे घराण्यातील संताजी घोरपडे यांनी राजारामांच्या कारकीर्दीतच वाई पुन्हा जिंकून घेतली. रामचंद्रपंतांचा मुतालिक शंकराजी नारायण येथील मुख्य अधिकारी झाला. नंतर वाई पेशव्यांच्या ताब्यात गेली. 1753 मधे राजारामाची बायको ताराबाई यानी 5000 रामोशी व मराठे यांचे सैन्य घेउन वाई काबीज केली. 1774 मधे राघोबादादाना मृत्यूदंड सुनावल्यानंतर पेशव्यांचे निस्पृह न्यायाधिश रामशास्त्री प्रभुणे वाईजवळ पांडव वाडीस येऊन राहिले. 1790 च्या सुमारास रास्ते येथे आले त्यानी येथे अनेक वाडे व देवळे बांधली. 1796 मधे आपल्या विरूद्ध बाजीराव व दौलतराव शिंदे यांची एकी झालेली पाहून वाईस मुक्काम ठोकला. पण पुढच्याच वर्षी हरिपंत फडके सैन्यासह आपल्याला पकडण्यास येत आहेत असे पाहून कोकणात पळ काढला.
1664 साली वाई प्रांत बाजी घोरपड्यांच्या ताब्यात हाता. तो त्याला मारून शिवाजी महाराजांनी घेतला. अफजलखान आल्यावेळी महाराजांचा हेर विश्वासराव दिघे बातम्या काढर्यासाठी येथे होता. खानाने आपली बायका मुले येथेच ठेवली होती. अफजलखानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी येथे राहणारे व अफजलखानाचे विश्वासू नोकर होते. येथूनच प्रतापगडावर बोलणी करण्यास खानाने त्याना पाठवले.
1776 मधे शिवाजी महाराजांनी वाईस वेढा दिला त्यांचा खिराच्या बागेत तळ होता. त्या वेळी वाईला कोट होता. वाई सर झाली. 1683 मधे संभाजी महाराजांशी लढताना येथे मरण पावला. 1689साली फितुरी केल्याबद्दल बक्षिस म्हणून औरंगजेबाने सूर्याजी पिसाळास येथील देशमुखी दिली 1690 मधे शंकराजी नारायणाने वाई काबीज केली. हैदरवर स्वारी करण्यास जाताना थोरल्या माधवरावांचा मुक्काम येथे होता. 1730 साली नानासाहेब पेशव्याचे रास्त्यांची मुलगी गोपिकाबाईंशी लग्न झाले.
वाईच्या उत्तरेस चार मैलावर लोहारे गावाजवळ आठ गुहा आहेत.
1818 दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दित ब्राह्मणाना दान दक्षिणा देण्यात खूप खर्च होई. सातारचे राज्य खालसा झाल्यावर ब्राह्मणात असंतोष पसरू नये म्हणून एलफिस्टनने येथे ब्रह्मणांची सभा बोलावून पूर्वीप्रमाणे दान दक्षिणा चाले राहिल असे आध्वासन दिले. स्वत: एलफिस्टनने येथे येऊन दानधर्म केला.
( साहित्य, नाटक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नावारूपाला आलेल्या कोल्हटकरांचे मुळ पुरूष वाई येथेच प्रथम पुजापाठास आले. साहित्यीक वारसा महादेवशास्त्री यांच्या रूपाने सुरू झाला. मराठी भाषेतील पहिला छापील काव्यसंग्रंह जो 1860च्या आसपास प्रकाशित झाला त्याचे नाव प्राकृत कवितांचे पहिले मराठी पुस्तक असे आहे. यांच्या पुडील पिढ्यात वामनराव, श्रीपाद कृष्ण, अच्युत बलवंत, महाराष्ट्रमित्रकार गणेश नारायण, चिंतामणराव, चित्तरंजन, बाळ कोल्हटकर आणि दिलीप कोल्हटकर यांचा समावेश होतो.
महाबळेश्वरहून जाता-येता वाईमध्ये गणपती, काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्याव्यतिरिक्त बघण्यासारखे भरपूर काही आहे. हा लेख वाचल्यावर वाईमध्ये मुक्काम करण्याची इच्छा नक्की होईल.
कसे जाल? कोठे राहाल? वाई हे गाव पुण्यापासून ९० किलोमीटरवर महाबळेश्वर रस्त्यावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन वाठार व सातारा. जवळचा विमानतळ पुणे. वाईमध्ये राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.पुण्याहून स्वारगेट बसस्थानकावरून वाईसाठी स्वतंत्र बससेवा आहे.- खासगी वाहनाने पुणे-बंगळूर महामार्गावरून सुरूर फाट्यावरून वाईकडे जाण्याचा मार्ग आहे. जवळच धोम, मेणवली, पांडवगड, मांढरदेव, पाचगणी, महाबळेश्वर ही पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक येत असतात.
वाईच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य तर आहेच, पण इतिहासाचा साक्षीदारही आहे. वाई गावापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कृष्णेची विविध रूपे पाहता येतात. वाईच्या आसपास नदीच्या उत्तर व दक्षिण बाजूला सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. वाईमध्ये शिरतानाच दिसतो तो पांडवगड जणू मुकुटमणी, बाजूला मांढरदेवी, पश्चिमेस केंजळगड, कमळगड, दक्षिणेस सोनजाईचा डोंगर, पूर्वेस वैराटगड.... हे सगळे गड वाई गावात शिरतानाच दिसतात. मांढरदेवी वगळता सर्व ठिकाणी पदभ्रमण (ट्रेकिंग) करीतच जावे लागते. वाईच्या पश्चिमेला नाना फडणवीसांची मेणवली, श्री क्षेत्र धोम व धोम धरण, रायरेश्वर, कमळगड ही ठिकाणे आहेत. मेणवली तसेच पुढे पांडवगड पायथ्याजवळून एक रस्ता सरळ काळूबाईला पण जातो. * सातारा-केळघर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-मेणवली-धोम-सातारा हा मार्ग सर्वागसुंदर आहे. २ दिवस फिरायला उत्तम. महाबळेश्वर आणि वाई दोन्ही ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते. पावसाळ्यात महाबळेश्वर रमणीय होते. * सातारा-धावडशी-मेरुिलग-लिंब गोवे-सातारा हा पण एक दिवसाचा प्रवासमार्ग सुरेख होतो. िलब गावी बासुंदी फार रुचकर मिळते. * सातारा-रहिमतपूर-अंभेरी काíतकेय मंदिर-वडूज-औंध-कराड-सातारा असा प्रवासमार्ग एका दिवसात करता येतो. कराडजवळ कोळे नृसिंहपूरची नरसिंहाची देखणी मूर्ती अवश्य पाहिली पाहिजे. इथे पाऊस अगदी कमी, त्यामुळे वर्षभर केव्हाही उत्तम. तरी शक्यतो उन्हाळा टाळावा.
नाना फडणवीस वाडा, मेणवली : -
वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले.
नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.
दीड एकर परिसरामध्ये बांधलेल्या या वाड्यात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथऱ्यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या सहायाने आणि भित्तीचित्राच्या अनोख्या शैलीने बांधल्या आहेत.
वाईवरुन येताना रस्त्याला डावीकडे फाटा फुटतो.या फाट्यावर नानांच्या वाड्याची दिशा दाखवणारा फलक आहे.गावातुन पाचच मिनीटात आपण वाड्यासमोर उभे रहातो. आजुबाजुला पार्किंगची सोय केली आहे.
या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो.
शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे.
या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
तिकीट काढून आत निघाले की उजव्या हाताला नगारखान्याकडे चढणारा भिंतीच्या आत असलेला जिना दिसतो.
इथून वर चढल्यावर नगारखान्याच्या खोलीत पोहचतो.मात्र आता तिथे नगारे नाहीत.
यानंतर आपला प्रवेश मुख्य वाड्यात होतो. वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.
वाड्याच्या बाह्य तटभितींस खिडक्या नाहीत. तात्कालीन संरक्षण गरजानुसार त्या बांधल्या आहेत. या वाड्याला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे १५ फूट आहे.
आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओसरी दिसते जिथे येणारे जाणार्या लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाई.तर डाव्या बाजुला घोड्याच्या पागा आहेत.मात्र त्या बाजुला पर्यटकांना प्रवेश नाही.त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.
मग आपण पोहचतो मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई.
याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे,
जवळच नाना फडणवीस यांचे जीवनचरित्र लावले आहे.
वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्यात असणार्या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत.
वाटेत वाड्याची देखणी प्रवेशद्वारे दिसतात.
या बुरुजावर चढणारी वाट अरुंद असली तरी वरुन मेणवली गावाचा नजारा दिसतो आणि पार्श्वभुमीवर पांडवगडाचा सुळका दिसतो.
हाच बुरुज मागच्या बाजुने असा दिसतो.
मुख्य वाडा आतून बघण्यासाठी पुन्हा मुख्य चौकात यायचे.ईथे उजव्या हाताला एक पाटी दिसते.
वाड्याचा काही भाग हा पर्यटकांसाठी बंदिस्त केला आहे.
भिंतीस असलेल्या खड्या जिन्याने वरच्या मजल्यावर जायचे.
काही दालन ओलांडून आपण पंगतीच्या चौकाच्या वरच्या सज्जात असतो.अर्थात वाड्याच्या या भागात प्रवेश नसल्यामुळे हा चौक वरुनच पहाता येतो.
याच चौकाच्या शेजारी दप्तराची खोली आहे.तिथे बैठक व लिखाणाचे टेबल ठेवलेले दिसते.यानंतर आपण एका महत्वाच्या दालनात येतो.
या वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे.
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे.
याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे.
यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो.
हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो.
छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो.
या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो.याठिकाणी वाड्याचा जो भाग पर्यटकांसाठी उपलब्ध आहे,त्याची फेरी पुर्ण होते.
हा वाडा मराठा वास्तूशैलीत बांधला आहे. उंच तटबंदीने धूळविरहित केला आहे. त्यात हवा खेळती राहिल आणि पुरेशा प्रकाशाचाही व्यवस्था केली आहे नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखात उभा आहे. १७७० च्या दरम्यान बांधलेल्या या वाड्याची देखभाल त्यांचे खापर पणतू अशोक फडणीस आजही करीत आहेत.
या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात.मुळचे अफ्रीकेत उगवणारे हे झाड शेकडो कि.मी दुर मराठी मातीत रुजले आहे. एखाद्या हत्तीच्या पायासारखा दिसणारा याचा बुंधा पर्यटकांचे आकर्षण आहे.
या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत.
फिकट पिवळ्या रंगाने छत रंगविले आहे. त्याच्या मध्यभागी समभूज चौकनात सुंदर पानाफुलांच्या वेलबुट्टींची चित्रेकाढली आहेत. बेलबुट्टी लाल व हिरव्या रंगात आहेत. मराठा स्थापत्य शैलीचे छत सुशोभीकरणाची प्रचलित शैली होय.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे प्रश्न पडतात.
बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा १७३९ मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
अशा घंटा नाशिकच्या शंकराच्या देवळात, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरात, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळात आढळतात. सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा त्या घंटा सुस्थितीत आहेत. मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्टय़ ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.
घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळला जात असावा.
वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.
येथे जाण्याचे मार्ग :
पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली. अथवा पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.
वामन पंडीत समाधी भोगाव : -
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी. यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते. वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे. धोमच्या अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका भक्ताने बांधलेली आहे.
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.
यादवकालीन स्तंभ
तिथेच झाडोर्यांत एक दुर्ल़क्षित वीरगळ आहे. तो जरुर बघावा.
धोमचे नृसिंह मंदिर : -
वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले आणि केंजळगड,पांडवगड उत्तरेचे रखवालदार्,पश्चिमेला धोम जलाशयात जहाजासारखा दिसणारा कमळगड, तर दक्षिणेला पाचगणी, महाबळेश्वरची डोंगररांग. स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. गावातून अरुंद डांबरी रस्त्याने मंदिराच्या परिसरात पोहचतो. गर्द वनराईने वेढलेला आणि कृष्णाकाठच्या रम्य प्रदेश अचुक हेरुन इथे मंदिर उभारणी केली आहे.
तिथल्या मंदिरातही वीरगळ दिसला
दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे.
अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे.
त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम केलेले दिसते.
मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
नृसिंह मंदिरामध्ये प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.
मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.
शिवमंदिरासमोरचा नंदीमंडप. हा पुष्करिणीतल्या दगडी कासवावर उभारलेला आहे.
लक्ष्मी नृसिंह
शिवमंदिराचा टिपीकल पेशवेकालीन शैलीतला कळस
धोम गावाच्या पाठीमागेच धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केलीय. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.
ह्याच झाडीत धोम गाव आहे.
भिंतीवरुन दिसणारा आजूबाजूचा परिसर
समोर आहे तो कमळगड
जांभळी ,वैशिष्ट्यपुर्ण वीरगळीचे गाव :-
रायरेश्वर पठाराच्या दक्षिण पायथ्याला जांभाळी हे वाळकी नदीच्या तीरावर वसलेले दुर्गम गाव हे. या गावातून एक वाट थेट रायरेश्वर पठारावर चढते आणि श्वानदर्याच्या वाटेला मिळते. या गावाला वाईवरुन थेट गाडी आहे.थेट जांभळी गाडी मिळाली नाही तरी वासोळे, खावली या गाड्या चालतात. कमळगडला जाताना आपण या जांभळी गावाला भेट देउ शकतो.गावात प्रवेश केल्यावर मुख्य चौकात आपल्याला एका झाडाखाली वीरगळी ठेवलेल्या बघायला मिळतात.
जांभळी गावात एका झाडाखाली काही शिल्प आणि वीरगळ ठेवलेले पहायला मिळतात.
पांडवगड :
समुद्रसपाटीपासून ४१७७ फूट (१२७३ मीटर) उंच असलेला हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात (११७८-९३) बांधला. किल्ला आकाराने खूप लहान आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ फक्त १० एकर आहे. किल्ल्याला सर्व बाजूंनी ५० ते ६० फूट उंचीचा उभा कातळ आहे. त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी मिळाली आहे. यादव राजांचे पतन झाल्यावर हा किल्ला बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला. त्यानंतर आदिलशहा व त्यानंतर शिवाजी महाराजांनी १३ ऑक्टोबर १६७३मध्ये किल्ला ताब्यात घेतला. तो अखेरपर्यंत मराठेशाहीच्या ताब्यात राहिला. सन १७११मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना त्या वेळचे सेनापती चंद्रसेन जाधव यांनी जेरीस आणले, त्या वेळी पिलाजीराव जाधवांनी बाळाजींना पांडवगडावर सुखरूप पोहोचविले. चंद्रसेन जाधवांनी शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथास आपल्या ताब्यात देण्यास सांगितले; पण शाहू महाराजांनी त्यास नकार दिला व हैबतराव निंबाळकर यांना चंद्रसेन जाधवांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्या वेळी आदर्कीच्या लढाईत चंद्रसेन जाधवांचा पराभव झाला व ते पन्हाळ्यास गेले आणि ताराबाईंच्या गोटात सामील झाले. पांडवगड धावडी लेणीमेजर थॅचरने १८१८मध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर जोत्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरून पाचगणी, कमळगड, केंजळगड व धोम जलाशयाचे विहंगम दर्शन होते. सध्या टीव्हीवर चालू असलेल्या ‘लागिरंझालं जी’ मालिकेच्या शीर्षकगीतावेळी धोम जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गडकोटांचे दर्शन होते. हा किल्ला पदभ्रमण (ट्रेकिंग) करणारांसाठी पर्वणी आहे. पांडवगडाच्या उत्तर दिशेला भग्न दरवाजा असून, ती एकमेव वाट आहे. किल्ला आकाराने लहान आहे. गडावर फक्त पडलेल्या इमारतींची जोती दिसून येतात. पाण्याची दोन टाकी, हनुमंताची उघड्यावर असलेली मूर्ती व पांडवजाईचे मंदिर येथे आहे. गडाच्या चारही बाजूंना उभे नैसर्गिक कातळ आहेत. त्यामुळे फारशी तटबंदी बांधलेली दिसून येत नाही. या गडावरून २५ ते ३० किलोमीटर अंतराचा भूभाग दिसतो. पूर्वेला चंदनगड व वंदनगड, पूर्व-दक्षिण कोपऱ्यात वैराटगड, पश्चिमेस कमळगड, केंजळगड, पाचगणी, महाबळेश्वरचा केट्स पॉइंट, उत्तरेस मांढरदेवी दिसते. धोम जलाशयाचे विहंगम दृश्य येथून दिसते. गडाचा उपयोग टेहळणी व इशारतीसाठी होत होता. पांडवगडाला जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक मेणवलीमार्गे व दुसरी धावडीमार्गे. मेणवली मार्ग कठीण आहे; पण ट्रेकिंगचा अनुभव मिळतो. दुसरा मार्ग धावडी /शेलारवाडीच्या बाजूने आहे. तो सोपा आहे. पांडवगड लेणी :
पांडवगडाच्या ईशान्येला धावडी गावाच्या हद्दीत बाजूला दोन बौद्धकालीन लेणी आहेत. त्यांना धावडी लेणी असेही म्हणतात. येथे एक चैत्य आणि एक विहार प्रकारातील लेणे असून, छोटा स्तूपही आहे.
मांढरदेवी : -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तिर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वाई व भोरपासून सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सातार्यातून २० कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे २०० कि. मी. अंतरावरचे हे ठिकाण आहे. वाई कडून किंवा भोर कडून या तीर्थक्षेत्राकडे जातांना घाट चढून जावे लागते. काळूबाईचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४६५० फूट उंचीवर आहे. मांढरदेवी येथील देवी माता पार्वतीचे रूप असुन काळेश्वरी या नावाने ओळखली जाते.
मांढरगडावरील आई काळूबाईचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मांढरगडावरील काळूबाई देवीचा महिमा अलौकिक आहे.अरुंद वाटा असलेली चढण चढत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते.शाकंभरी पौष पौर्णिमेला दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनाला येतात. मांगिरबाबांच्या देवळाशी नारळ फोडून, काळूबाईचे दर्शन घेणे आणि दीपमाळेत तेल घालणे अशा परंपरेसह भाविक दर्शन घेतात . देवीला पौराणिक पोळी आणि दही भात दिले जाते. साधारण तीन लाख भाविक इथे उपस्थित असतात.
देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच अशा टेकडी वर मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे . .मंदिराचा अंतर्गाभारा, गाभारा व सभामंडप असे तीन भाग आहेत. सभामंडपाचे बांधकाम अठराव्या शतकात झाले. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत.मुख्य दरवाजाशी दगडी कासव आहे. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन सिंह असून, तो संगमरवरी दगडात आहे. देवीची पालखी चांदीची असून विशेष प्रसंगी व मिरवणुकीच्या वेळी देवीची छबिन्यासह मिरवणूक निघते. नवसाला पावणारी व भक्तांचे कल्याण करणारी देवी म्हणून काळूबाई देवीची ख्याती आहे. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहेअनेकांचे कुलदैवत असणाऱ्या काळूबाईचा मांढरदेव गड महाबळेवर इतक्याच उंचीवर वसला आहे. या ठिकाणी हवामान नेहमी थंड असते.
मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चत्रुभुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे.देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपुर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व चेहर्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह आहे.
काळेश्वरीची महती
काळेश्वरीची मूळ तीन रूपे आहेत. यामध्ये पहिले उग्ररूपी तामस (कोलकत्ता), दुसरे सत्त्वरूप (गुजरात येथील पावागड), तर तिसरे राजसरूप हे मांढरदेव येथे पहायला मिळते. घटस्थापना, ललिता पंचमी, अष्टमी, नवमी व दसऱ्याला देवीच्या दर्शनासाठी यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून भाविक येतात. मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमेला दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. या देवीचे मूळ नाव काळूबाई (काळेश्वरी) असून ती काळूआई, मांढरदेवी या नावाने ओळखली जाते. काळेश्वरी याचा अर्थ जी काळाची ईश्वर आहे ती किंवा काळाला नियंत्रित करणारी शक्ती ती काळेश्वरी. शैव व शाक्त पंथीयांमध्ये या स्थानाला विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारी, कार्य सिद्धीस नेणारी, भक्तांवरील संकटात त्वरेने धावून येणारी अशी काळूबाईची ख्याती आहे.
देवीची अनेक रूपे आहेत. आदिशक्ती, आदिमाता, तुळजाभवानी, कलेची शारदा, संपत्तीची लक्ष्मी, दुर्जनांचा संहार करणारी आदिशक्ती आदिमाता मांढरदेवची काळूआई, काळेश्वरी, काळूबाई, मांढरदेवी म्हणतात. ही देवी म्हणजे पार्वतीचे साक्षात कालिमातेचे रूप असे सांगितले जाते.
आख्यायिका – सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिध्दिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरवात केली. तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले. आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने रात्री चा वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युध्दासाठी आवाहन केले आणि तुंबळ युध्द करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली.
मांढव्यऋषींच्या नावावरून देवीला मांढरदेवी आणि गावाला मांढरदेव असे नाव पडले. आणखी एक आख्यायिका अशी- पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री काळेश्वरीने देविलाख्यासुर राक्षसाचे शिर उडविले. ते शिर देवीच्या चरणावर पडले. देवीलाख्याच्या रक्तावर सूर्यकिरण पडले तर अनेक राक्षसांसह जिवंत होण्याचा वर त्याला होता. देवीलाख्यासुर पुन्हा जिवंत होऊन काळेश्वरीशी युद्ध करण्याची शक्यता सटवाईने काळेश्वरीस सांगितली. सूर्योदयूार्वी विशालकाय देह धारण करून काळेश्वरीने त्याचे सर्व रक्त नष्ट केले. हे सर्व जाणून देवी लाख्यासुर काळेश्वरीला शरण गेला. काळेश्वरीच्या चरणाजवळ आश्रय देण्याची विनंती केली. त्यावर देवीने त्याला चरणाजवळ आश्रय दिला.
याशिवाय अजून एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी, देवासुर संग्रामानंतर जे काही राक्षस उरले त्यांना देवीने युद्धामध्ये पराजित केले. पण महिषासूर व रक्तबीज हे राक्षस मात्र काही केल्या पराजित होत नव्हे. कारण त्यांना अभय होते. त्यांचे निर्दालन करावे म्हणून सर्व देव पार्वतीकडे गेले. देवी व तिचे सर्व सैन्य शिवगण, दाक्षायणी, चंडिका युद्धास सज्ज झाली व घनघोर युद्ध झाले.
अनेक राक्षस मारले गेले. शेवटी महिषासुर शरण आला. त्याला देवीने आपल्या पायाजवळ स्थान दिले. देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते. रक्तबीजाला मारण्यासाठी तिने अष्टायुधे धारण केली. आक्राळविक्राळ रूप धारण करून त्याला ठार मारले. त्यानंतर देवीला शांत करण्यासाठी स्वत: शंकर देवीच्या मार्गात झोपले. गर्जना करत देवी फिरत असताना तिचा पाय शंकराला लागला आणि तिचे तेजपुंज शरीर काळवंडले, म्हणून तिला काळूबाई, कालिका असे म्हणतात. त्यानंतर देवी श्रमपरिहारासाठी मांदार पर्वतावर म्हणजेच मांढरदेव डोंगरावर गेली.
एका आख्यायिकेनुसार मांढरदेव येथील पाटील घराण्यातील भाविकाला दृष्टान्त झाला म्हणून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन जमीन खोदली. त्यांना जमिनीत देवीची मूर्ती आढळली. तिथेच त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. दुसरी आख्यायिका आहे की येथील महादेवाच्या मंदिरात मांढव्यऋषी तपश्चर्या करीत होते. ते शिवभक्त होते. त्यांना दैत्य नावाचा राक्षस त्रास देत होता. शंकराने महाकालीद्वारे या दैत्याचा नाश केला. त्याच्या सन्मानार्थ मांढव्यऋषी व गावकऱ्यांनी डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले.
देवीने पौष पोर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमे ला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यानच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.
कमळगड :
रायरेश्वरावरूनच दक्षिणेस असलेल्या कमळगडाचे दर्शन होते. याचे नाव काही जण कमालगड असे उच्चारतात. धोम धरणाच्या जलाशयामुळे कमळगड एखाद्या बेटासारखा दिसतो. कमळगडावर इतर गडांप्रमाणे बुरुज, तटबंदी काही नाही. तसेच काही इतिहासही नाही. येथे एक कावेची (गेरू) विहीर आहे. ही विहीर ५० ते ५५ पायऱ्या उतरून खाली जावे लागते. तळाशी पोहोचल्यावर चहूबाजूंना खोल कपारी असून, सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. हा किल्ला ट्रेकर्ससाठीच आहे. महाबळेश्वरहून गुरेघरवरून खाली उतरून नांदगणे गावापासून पुन्हा चढण घेत येथे पोहोचता येते. महाबळेश्वरचा केट्स पॉइंट, पाचगणीचा पारशी पॉइंट येथूनही हा किल्ला दिसतो. गडाला जोडून येणारी एक डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात. जलाशयाच्या मधोमध असलेल्या आकोशी गावातूनही येथे जाता येते. धोम धरण होण्याच्या अगोदर मी येथे जाऊन आलो होतो व बऱ्याचदा जात असे. तरुणांनी हा ट्रेक अवश्य करावा.
कमळगड - कावेची विहीर
कोंडवली :
कमळगडाच्या दक्षिण उतारावर कोंडवली हे गाव आहे. प्रतापगडावर अफझलवधाच्या वेळी शिवाजी महाराजांना वाचविणारे जिवा महाला यांचे हे गाव. त्यांचे छोटे स्मारकही गावात आहे. केंजळगड :
महादेवाच्या डोंगरातील रायरेश्वरनंतर दिसतो केंजळगड. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजांनी १२व्या शतकाच्या उत्तरार्धात केली. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. दक्षिण बाजूला धोम जलाशय व उत्तरेला देवघर जलाशय आहे. मागे जवळच रायरेश्वराचे पठार आहे. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक विहंगम दृश्य दिसते. येथून कमळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात. नाकिंदा या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात. केंजळगड घेरा केलंजा, आणि मनमोहनगड या नावांनीही ओळखला जातो. ‘मनमोहनगड’ हे शिवरायांनी दिलेले नाव आहे. या अशा दुर्गांनीच तर औरंगजेबाला २६ वर्षे कडवी झुंज दिली. त्यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, ‘जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला, तर तो जिंकणे फार अवघड आहे.
लोहारे लेणी :
वाई गावाच्या ईशान्येस असलेल्या सुलतानपूर गावात सातवाहन काळातील नाणी सापडली होती. तसेच जवळच असलेल्या लोहारे लेण्यांचा वार्टर फ्रेअर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सन १८५०मध्ये प्रथम उल्लेख केला. येथे आठ लेण्यांचा समूह आहे. ही लेणी पालपेश्वर लेणी म्हणून ओळखली जातात. ही लेणी सातवाहन काळातील आहेत. या भागातील किवरा ओढ्याजवळ काही ठिकाणी अश्मयुगीन हत्यारेही सापडली आहेत. तसेच सातवाहन काळातील नाणीही सापडली आहेत.
पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा :-
वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे.
गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास तयार नव्हते.
शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.
महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर आहे.
ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
धोम धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.
पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.
शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते.
येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले जातात.
कीर्तिवंतांचं गाव :-
पसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे. गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.
शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.पसरणीच्या चामडी बुटांची ब्रिटिशांना भुरळ. पसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती. इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय करतात.
धोम धरण :-
वाईकडून महाबळेश्वर्,पाचगणीकडे जाताना वाटेत आवर्जून बघायचे ठिकाण म्हणजे धोम धरण. वाईपासून २१ कि.मी.वर धोम धरण आहे.इथे आता वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले आहेत.आपण स्पिड बोट किंवा वॉटर स्कुटरचा आनंद घेउ शकता, तसेच इच्छा असेल तर नौकानयन करु शकता. धोम धरण हे शेतीसाठी व औध्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून १९८२ साली बांधले.आज हे ठिकाण पर्यटनकेंद्र झाले आहे.इथे मोठ्या प्रमाणात चित्रपटाची शुटींग होतात.सी प्लेन यशस्वीपणे पाण्यावर उतरायचा प्रयोग धोम धरणाच्या बॅक वॉटरवर केला गेला.
पाचगणी
पाचगणीचा मानबिंदू टेबल लॅंड
भोसे या खेडेगावात मालाज फुड प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. येथे विविध फळांचे जाम जेली मार्मालेडस्, क्रशेस व सिरपचे उत्पादन केले जाते. मधाच्या बाटल्याही मिळतात.
मॅप्रो फुड प्रोडक्ट्
गुरेघर येथे ही जामची फॅक्टरी आहे. हा कारखाना आठ एकर परिसरात आहे. तेथील ग्रीन हाऊसमध्ये शेकडो प्रकारचे कॅक्टस् पहावयास मिळतात. विविध रंगी व आकाराची गुलाबपुष्पे व इतर प्रदर्शनीय आकर्षक वनस्पती पहावयास मिळतात. मॅप्रो गार्डन हे ब्रेकफास्टसाठी पर्यटकात प्रसिध्द आहे.इथे मॅप्रोची उत्पादन मिळतात.पाचगणीपासून हे फक्त सहा कि.मी.वर आहे.इथे क्लासिक ग्रिल्ड सँडवीच्,मिनी ग्रिल्ड सँडविच्,पीझ्झा आणि फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम विथ आईसक्रिम उत्तम मिळते.
Mapro Garden
Mapro menu Card!
Fresh Strawberry Cream
देवराई आर्ट व्हिलेज
अंतर – पाचगणीपासून १.८ किलोमीटर अंतरावर.
जर आपण कलाप्रेमी असाल आणि हस्तकलेतून वस्तु तयार होताना बघायच्या असतील तर देवराई आर्ट व्हिलेजला भेट द्यायलाच हवी.इथे ना नफा ना तोटा तत्वावर वस्तु तयार केल्या जातात. छत्तीसगड,गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आदीवासी बांधवामधील कौशल्य विकसित करुन त्यांना इथे पारंपारीक वस्तु तयार करायला प्रोत्साहन दिले जाते. पितळ्,लोखंड्,लाकुड्,बांबु,कापड यापासून केलेल्या वस्तु इथे आपण खरेदी करु शकता.
महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यावर पाचगणीजवळ हे अम्युझमेंट पार्क आहे.हे पार्क २००८ साली सुरु झाले.इथे आपण विवीध प्रकारचे खेळांचा आनंद घेउ शकतो. ४५० मीटर लांबीचा, ६ मीटर रुंदीचा आणि पाच वळणं असलेला गो कार्टींग ट्रॅक ईथे आहे.याशिवाय ९०० सी.सी. बाईकने ३५० मीटर लांबीच्या ट्रॅकवर ऑफ रोड ड्रायव्हिंगचा आनंद घेता येईल.२० मीटर उंचीच्या ड्रॉप टॉवर वरुन वेगाने खाली येण्याचा आनंद घेता येईल.१५ मीटरची बंगी जंप करता येईल.याशिवाय डॅशिंग कार्,र्हेडो बुल्,गायरोस्कोप, जायंट व्हिल, बंगी ट्रॅम्पोलिन, हँगींग मेरी गो राउंड तसेच बलुन शुट, एअर हॉकी,बास्केटबॉल आर्केड, किडल राईड हे इन डोअर गेम आहेत.इथे शुध्द शाकाहारी रेस्टॉरंट आहे.दक्षिण भारतीय,पंजाबी, इटालियन, चायनीज असे फास्ट फुड उपलबध आहे. याशिवाय आइस्क्रिम्,स्नॅक्स देखील आहेत.मसाज चेअर, ए.टी.एम.,पेट्रोल पंप, टॉय शॉप,फ्रूट प्रॉडक्ट्,फ्रि पार्किंग झोन, रेस्ट रुम या सुविधा उपलब्ध आहेत. Games Cost 50 Coins for Indoor Games 100 for Air Hockey 200 for Dashing Cars 350 for Go-karting (Single Seater) 4 Laps 600 for Go-karting (Double Seater) 4 Laps 100 for Gyroscope 70 for Hanging Merry Go-Round 150 for Bungee Trampoline 200 for Bungee Ejection 200 for Drop Towers(Free Falls) 90 for Shooting 150 for Rodeo Bull 70 for Gaint Wheel उपलब्ध वेळ - सोमवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री ११ वा. संपर्क क्रमांकः- 09619 592593, 02168 241451 पत्ता :- व्हेलॉसिटी एंटरटेनमेन्ट्झ, भोसे, पाचगणी रोड, सातारा, महाराष्ट्र
हॉलिवुड वॅक्स म्युझियम :-
मेघना फुड स्टुडीओ यानी हे वॅक्स म्युझीयम सुरु केले.इथे अण्णा हजारे,नरेंद्र मोदी,बराक ओबामा,अंजेलिना ज्यॉली,मेस्सी,मायकेल जॉन्सन आणि इतर प्रतिथयश व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत.या म्युझीयमची प्रवेश फी २००/- आहे.याशिवाय मिरर मेझही आहे.इथेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी गो कार्टीग, ९डी सिनेमा, धडकणार्या गाड्या, याशिवाय खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत.
Contact No: +91- 9850600634 / +91- 9422034729
Monday to Saturday – 10:00 am to 7:00 pm
Sunday – 10:00 am to 5:00 pm
पुस्तकांचे गाव भिलार :
महाबळेश्वरला जातानाच्या रस्त्यावर भोसे खिंड येथून डावीकडे भिलार हे स्ट्रॉबेरीचे गाव आहे. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरच हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पाचगणीला येणारे पर्यटक स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी भिलारला पोचतात; परंतु आता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नव्या ढंगात प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, साहित्य सांस्कृतिक कार्यालय मंत्रालय आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलार आता सजले आहे. पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबविणारे भिलार हे देशातील पहिले, तर जगातील दुसरे ठिकाण आहे, या गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार भि. दा. भिलारे यांचे हे गाव.स्ट्रॉबेरी हंगामात या गावात, तसेच आसपासच्या गुऱ्हेघर, भोसे व कासवंड गावात स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा केला जातो. पर्यटकांना प्रत्यक्ष शेतात जाऊन स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. तसेच या गावातून पर्यटकांसाठी होम-स्टे (निवासी व्यवस्था) सुविधा राबविली जाते.पाचगणीत आल्यावर पुस्तकांचे गाव न पाहणे म्हणजे एक प्रकारची रुखरुखच म्हणावी लागेल. पर्यटक आवर्जून या गावाला भेट देताहेत. तसेच साहित्यिक या गावाला भेट देण्यास येत असल्याने तेही पाचगणीची सफर करू लागले आहेत. गुऱ्हेघर येथे शासनाची शेती व वनसंशोधन संस्था आहे.
दांडेघर : पाचगणीला वाई रस्त्यावर दांडेघर म्हणून ठिकाण आहे. येथे केदारेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे भेट दिली होती. दर वर्षी दसऱ्याला दांडेघरचे श्री केदारेश्वर व पसरणीचे काळभैरवनाथ यांचा भेट सोहळा अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. दांडेघर येथील केदारेश्वर मंदिर, भुतेश्वर ही शिवकालीन मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात.
गोडवली : हे तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव, त्यांचा जन्म उमरठ येथे आजोळी झाला. त्यांचे लहानपण येथेच गेले. या गावात स्मारकही उभारण्यात आले आहे. येथील वाटाणा उत्पादकांसाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासह सुधारित तंत्रज्ञान पुरवण्यात आले आहे. गोडवलीतील तपनेश्वर मंदिर प्रेक्षणीय आहे.
राजपुरी लेणी :-
पाचगणी या गिरिस्थानाच्या सभोवार विखुरलेली पांडवकालीन, शिवकालीन स्थळे पर्यटकांना खुणावतात. राजपुरीच्या लेण्या ( ज्याला स्थानिक पांडवकालीन गुहा म्हणतात ) या परिसराचा इतिहास सांगतात. कार्तिकस्वामीच्या गुहा म्हणून या प्रसिद्ध आहेत. या पुरातन शैव गुंफा आहेत. येथे एकूण सात गुंफा आहेत. त्यापैकी चार पूर्ण व तीन अर्धवट आहेत. तेथे पाण्याची कुंडे आहेत. प्रत्येक गुंफेतून झोपून दुसऱ्या गुंफेत जाता येईल अशी व्यवस्था आहे. गुंफांमध्ये काही भित्तिशिल्पे पूजेसाठी ठेवलेली दिसतात. पावसाळ्यात पाझरून येणारे पाणी गुंफेच्या तोंडावर पडत असते. स्थानिक ग्रामपंचायतीने एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या आपल्याला लेण्याकडे घेउन जातात.
वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती. कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजेसाठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत. बाकीच्या लेण्यात लक्षवेधी काही नसले तरी शैलगॄहात दहाव्या किंवा अकराव्या शतकातील सोमनाथदेवाचा मराठी देवनागरी लिपीतील शिलालेख आहे.हा शिलालेख प्रजापती सवंत्सरातील असला तरी संवत्सर व शक याचा उल्लेख नाही.त्यात राजवंशाचाही उल्लेख नाही.या शिलालेखात श्रीपतीनायक्,ददनायक ( श्रीपतीनायकाचा पिता ) विनायक आणि इदोप्य नामक व्यक्तिनामांचा आणि वणगृह ( राजपुरी गावाच्या उत्तरेला असलेल्या चार्,पाच कि.मी.वरच्या वणघर गावाचा ) व बावधन ( वाईच्या दक्षिणेला पाच कि.मी. असलेल्या गावाचा ) या गावांच्या नावाचा उल्लेख आहे.लेखात राजपुरी येथील सोमनाथच्या देवळाचा इतिहासही आलेला आहे.या दैवताचा प्रथम अवतार जलसंपात ( किंवा जलसंपत्ती ) देवाने जेव्हा सोमभुविनीस ( सोमनाथ ) उपदेश केला तेव्हा झाला होता. पुढे सोमनाथास श्रीपती नायकाच्या वंशातील कोणा विनायकाने उंच नेले व त्याच्याच वंशातील कोण्या इदोप्य नामक व्यक्तीने सोमनाथाचे देउळ बांधले.सध्या मात्र राजपुरीच्या लेणीपेक्षा इथे असलेली कार्तिकस्वामीची मुर्ती हे भाविकांचे खरे आकर्षण आहे.कार्तिक पौर्णिमेला इथे भाविकांची थोडीफार गर्दी होते.एरवी इथे कोणी फार फिरकत नाहीत.मात्र हि मुर्ती बरीच अलिकडची असावी.
गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास असे मानतात.अर्थातच त्यात तथ्य नाही.इथे विष्णु मुर्ती व इतर कातळकोरीव शिल्प दिसतात.तिन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाडी आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे . अंतर – पाचगणीपासून ६.७ किलोमीटर अंतरावर.
कसे जाल, कोठे राहाल महाबळेश्वर, पाचगणीला?
महाबळेश्वर व पाचगणीला मुंबईहून महाड, पोलादपूरमार्गे, तसेच पुण्याहून वाईमार्गे जाता येते. तसेच कोल्हापूरकडून सातारा, मेढामार्गे जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन सातारा व वाठार - ६० किलोमीटर. जवळचा विमानतळ पुणे - १३० किलोमीटर. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून येथे जाता येते. दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी मध्यम आणि उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत.
सातारकर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे सातारा शहर आणि परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यासंदर्भातील अनेक ऐतिहासिक स्थळे सातारा आणि परिसरामध्ये विखुरलेली दिसतात. सातारा परिसराचे वैशिष्टय़ म्हणजे पश्चिमेचा प्रदेश हा सह्य़ाद्रीच्या निकट सान्निध्याचा, भरपूर पावसाचा आणि याच सातारा जिल्ह्य़ाच्या पूर्वेचा प्रदेश पर्जन्यछायेमधला, दुष्काळी. कृष्णा, कोयना अशा नद्यांचा हा प्रदेश, पण या नद्यांपासून अंतर असलेल्या प्रदेशात आजही पाण्यासाठीची वणवण चालूच आहे. महाबळेश्वरसारखे उत्तुंग गिरिशिखर लाभलेला हा प्रदेश. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा प्रदेश. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा प्रदेश. वाई, मेणवली, धोम ही तीर्थक्षेत्रे याच प्रदेशात आहेत, तसेच निरनिराळी मंदिरे, देवस्थाने, किल्ले यांनीसुद्धा हा प्रदेश संपन्न आहे. सध्याच्या विकासाच्या युगात पवनचक्क्यांचा प्रदेश अशीसुद्धा आता ओळख सांगता येईल इतक्या पवनचक्क्या सातारा आणि आसपासच्या डोंगरांवर दिमाखात फिरताना दिसतात. कोकणात जाणारे अनेक प्राचीन घाटमार्ग सातारा परिसरातून खाली उतरतात. प्रतापगड, अजिंक्यतारा, वासोटा, मकरंदगडसारखे बेलाग किल्लेसुद्धा याच प्रदेशात पाहायला मिळतात.
महाबळेश्वर :
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिस्थान व सातारा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सहयाद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी घनदाट वनश्रीची मुक्त उधळण झाली आहे. महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्याच्या गावापासुन महाबळेश्वर ३२ की.मी. अंतरावर आहे. सातारा शहर ४५ की.मी. अंतरावर आहे. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे. पुण्यापासून नैर्ऋत्येस १२१ किमी. अंतरावर आहे. मुंबईपासून २५० किलोमीटरच्या अंतरावर असून, पश्चिम घाटाच्या सह्यपर्वरांगांमधील एका विस्तृत सपाट पृष्ठभागाच्या सोंडेवर महाबळेश्वर वसले आहे. सिंदोला टेकडी हे येथील सर्वोच्य (१,४३५.६ मी.), तर कॉनॉट शिखर (१,४१५.५ मी.) हे दुसरे उल्लेखनीय शिखर होय. मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम याने १८२८ मध्ये साताऱ्याच्या राजाकडून जागा मिळवून तेथे या गिरिस्थानाची स्थापना केली. त्याच्या नावावरूनच याला ‘माल्कमपेठ’ असे नाव पडले.
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.महाबळेश्वरचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२३ सेमी. असून जुलैमध्ये तेथे सर्वाधिक पाऊस पडतो. हिवाळ्यातील सरासरी तपमान १७.४० से., तर उन्हाळ्यातील सरासरी तपमान ३२.२० से. असते. ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान आल्हाददायक बनते. मार्च ते मे या काळात पर्यटकांची जास्त वर्दळ असते.
भरपूर पर्जन्यामुळे महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर दाट वनश्रींनी वेढलेला असून अनेकविध वनस्पतिप्रकार येथे आढळतात. त्यांत जांभूळ, ओक, हिरडा, अंजन, आंबा, बेहडा, वरस, कारवी यांचे प्रमाण असून आर्थिक या महत्त्वाच्या आहेत. जंगलात बिबट्या, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, वानर, माकडे इ. प्राणी व वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. महाबळेश्वरच्या पक्ष्यांमध्ये बुलबुल, स्परफाउल, बर्ड ऑफ पॅरडाइज, सोनेरी हळदी, पाण कावळा, सुतार पक्षी, सारिका पक्षी, कोकिळा तसेच हनीसकर यांसारखे विविध प्रकारचे पक्षीही दिसून येतात.
शहरापासून उत्तरेस सु. चार किमी. वर जुने क्षेत्र महाबळेश्वर आहे. यावरून या गिरिस्थानाला महाबळेश्वर हे नाव पडले. महाबळेश्वराच्या मंदिराजवळ कृष्णाबाई व अतिबलेश्वर (विष्णू) ही दोन मंदिरे आहेत. कृष्णाबाई मंदिरात कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री ह्या पाच नद्यांची उगमस्थाने दर्शविली जातात. तीन मीटर अंतरावर या पाच नद्यांचे पाणी एकत्र येऊन एका गोमुखातून एका कुंडात पडते व त्यातून दुसऱ्या कुंडात जाते. याला ‘ब्रम्हकुंड’ असे म्हणतात. याशिवाय दर बारा वर्षांनी प्रकटणारी भागीरथी व दर ६० वर्षांनी प्रकटणारी सरस्वती या दोन नद्या वरील पंचनद्यांच्या दोन्ही बाजूंस असल्याचे भाविक मानतात. महाबळेश्वर अथवा अतिबलेश्वर ही नावे ‘महाबल’ व ‘अतिबल’ या दोन बलवान व शूर अशा राक्षस बंधूंवरून आली, अशी आख्यायिका आहे. फाल्गुन महिन्याच्या वद्य पक्षात पाच दिवस कृष्णाबाईचा उत्सव, आश्विन महिन्याच्या वद्य पक्षात दहा दिवस नवरात्र व माघ महिन्यात सात दिवस शिवरात्री, असे तीन उत्सव दरवर्षी होतात. येथे माणिकबाई व गंगाबाई हिंदू आरोग्यधाम आहे.
कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले.
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची आवडती अशी अनेक सौंदर्यस्थळे (पॉइंट्स) आहेत. उदा., आर्थरसीट (स. स. पासून उंची १,३४७.५ मी.), एल्फिन्सन पॉइंट (स. स. पासून उंची १,२७५ मी.) सिडनी किंवा लॉडविक पॉइंट (१,२४० मी), बाँबे पॉइंट, कार्नाक, फॉकलंड, सासून, बॅबिंग्टन (१,२९४ मी.), केट्स पॉइंट, सिंदोला, विल्सन पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर, वेण्णा लेक (सरोवर), प्रतापसिंह उद्यान, वेण्णा किंवा लिंगमळा धबधबा ही महाबळेश्वर येथील सौंदर्यस्थळे असून प्रतापगड, मकरंदगड, कमळगड, पाचगणी ही परिसरातील सौंदर्यस्थळे आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ त्यांच्या नावांनीच ही सौंदर्यस्थळे ओळखली जातात. बाँबे पॉइंटवरून सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यास पर्यटक विशेष उत्सुक असतात. आर्थरसीटपासून ६० मी.खाली असलेला झरा (टायगर स्पिंग), केट्स पॉइंट येथील नाक खिंड (नीडल होल), वेण्णा सरोवरातील नौकाविहार व जवळच असलेला लिंगमळा धबधबा (१५२ मी.) व त्याचा परिसर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत.
येथील फ्रेअर हॉल १८६४ मध्ये बांधण्यात आला असून त्यात ग्रंथालय व वाचनालय आहे. येथे महाबळेश्वर क्लब, पारशी जिमखाना, हिंदू जिमखाना इ. असून टेबल-टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांच्या सोयी आहेत. अलीकडे येथे स्केटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहे, बेकविथ स्मारक इ. वास्तू येथे आहेत. स्ट्रॉबेरी, रासबेरी ही येथील वैशिष्ट्यपूर्ण फळे होत. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी तसेच मुरंबे व जेलीसाठीही प्रसिद्ध आहे. गहू, नाचणी, वरी, तांदूळ, सातू, कोबी, तांबडे बटाटे, गाजरे ही कृषिउत्पादने येथे घेतली जातात. कॉफीचीही लागवड करण्यात आलेली आहे. शासनातर्फे सिंकोनाच्या झाडांची लागवड करण्यात आली, परंतु ती विशेष यशस्वी झाली नाही. येथे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. (स्था. १९४१). प्रामुख्याने तांबेरा-प्रतिबंधक गव्हाच्या जाती शोधून काढण्यासाठी हे संशोधन-केंद्र कार्य करते. येथे तीन मधुमक्षिकागृहे आहेत. त्यांपैकी एक खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे, तर ‘मधुकोश’ व ‘मधुसागर’ ही दोन सरकारी संस्थांमार्फत चालविली जातात. आकर्षक नक्षीकाम केलेल्या पांढरीच्या काठ्या तयार करणे, पर्यटकांची घोड्यांवरून रपेट मारण्याची होस पुरविणे, पर्यटकांसाठी हॉटेल व राहण्याच्या सोयी उपलब्ध करून देणे इ. व्यवसाय येथे चालतात. पर्यटकांसाठी राज्य शासनातर्फे हॉलिडे कँपचीही (विश्रामधाम) सोय आहे. १८६७ मध्ये येथील नगरपालिकेची स्थापना झाली. पर्यटकांपासून नगरपालिकेला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. महाबळेश्वर-पाचगणी विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून ‘सुंदर महाबळेश्वर योजने’ला गती मिळाली आहे.
महाबळेश्वर म्हटले की निळ्याशार पर्वतरांगा, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगरातून वाहणारे पाण्याचे सुंदर धबधबे, आणि अर्थातच रसाळ स्ट्रॉबेरी या सर्वच गोष्टी नजरेसमोर उभ्या राहतात. ब्रिटीशकालीन ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’चे ‘समर कॅपिटल’, म्हणजेच उन्हाळ्याच्या काळातली ‘राजधानी’ असलेल्या महाबळेश्वरमध्ये ब्रिटीश उच्चपदस्थ अधिकारी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येऊन राहत असत आणि त्या दिवसांपुरता सर्व कारभार इथूनच चालविला जाई. आता ब्रिटीशांचे भारतावर अधिपत्य काही दशकांपूर्वीच संपुष्टात आले असले, तर महाबळेश्वर मात्र अजूनही ‘समर कॅपिटल’ म्हणून लोकप्रिय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि खास स्ट्रॉबेरीच्या मोसमामध्ये महाबळेश्वरला पर्यटकांची नेहमीच भरपूर गर्दी होत असते. मात्र केवळ एक उत्तम पर्यटनस्थळ इतकीच या ठिकाणाची ओळख नाही. या गावालाही स्वतःचा खास इतिहास आहे. येथे असलेल्या प्राचीन मंदिरांपासून ते गावातल्या मध्यवर्ती पेठेपर्यंत, अनेक गोष्टी या गावाच्या इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत.
महाबळेश्वरशी निगडीत अनेक रोचक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. एका आख्यायीकेच्याप्रमाणे सृष्टीचे आणि मनुष्यप्राण्याचे निर्माण केल्यानंतर भगवान ब्रह्मांना पश्चात्ताप होऊ लागला. आपल्या कृत्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी महाबळेश्वरच्या अरण्यांमध्ये ब्रह्मांनी कठोर तप सुरु केले. जेव्हा ब्रह्मा ध्यानस्थ बसले होते, तेव्हा महाबली आणि अतिबली या दोन असुरांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा चंग बांधला. हे पाहून भगवान विष्णू ब्रह्माच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अतिबलीचा वध केला. महाबलीला मात्र इच्छामृत्यूचे वरदान असल्याने त्याचा वध करणे अशक्य होते. म्हणूनच देवी महामायेची मदत विष्णूंनी मागितली. देवी महामाया सौंदर्यवती असल्याने तिच्या रूपाने महाबलीला भुरळ पडली. तिला मिळविण्यासाठी ती जे काही मागेल ते देण्यास महाबली तयार झाला. महामायेने ही संधी घेऊन महाबलीकडे, त्याचा मृत्यू मागितला. महामाया जे काही मागेल ते तिला देण्यासाठी महाबली वचनबद्ध असल्याने आपल्या मृत्यूचा स्वीकार त्याला करावाच लागला, पण तत्पूर्वी आपले नाव श्री शंकराशी जोडले जावे असा वर महाबलीने महामायेकडे मागितला. म्हणूनच या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर पडले असल्याची आख्यायिका आहे.
यादवकालापासूनच महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. चौदाव्या शतकापर्यंत या ठिकाणावर यादव राजांचे आधिपत्य होते. त्यानंतर मात्र अनेक निरनिराळ्या वंशांच्या राजकर्त्यांचे आधिपत्य या ठिकाणी होते. यांमध्ये दिल्लीच्या मुघल दरबाराचे प्रतिनिधित्व करणारे मुस्लीम राजे, बहामनी वंशाचे राजे, व बहामनी राज्यांपासून वेगळे झालेल्या विजापूर आणि अहमदनगरच्या राज्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता. जेव्हा महाबळेश्वरवर अहमदनगरच्या निझामांचे आधिपत्य होते, तेव्हा महाबळेश्वरची जबाबदारी निझामांनी शिर्के कुटुंबीयांवर सोपविली. पण आपापसात काही मतभेद झाल्याने शिर्के आणि निझामांचे संबंध बिनसले आणि त्यानंतर महाबळेश्वरची जबाबदारी शिर्के मंडळींकडून काढून घेऊन मोरे कुटुंबियांना देण्यात आली. हेच मोरे कुटुंब पुढे जावळी आणि महाबळेश्वरचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मोऱ्यांच्या पुढील सात पिढ्यांचे महाबळेश्वरवर आधिपत्य राहिले.एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. इ.स. सन १२१५ मध्ये यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. एकतपाच्या तीर्थाटनानंतर इ. स. १६४४ साली समर्थ रामदास स्वामींनी सर्व प्रथम येथे येवून धर्मउपदेश देण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी पहिले मारुतीचे मंदिर बांधले.
त्यानंतरही महाबळेश्वर वर निरनिराळ्या सत्त्ताधीशांचे अधिपत्य राहिले. कधी यावर पेशव्यांचे आधिपत्य होते, तर कधी हे गाव सातारकर छत्रपतींच्या अधीन होते. एकोणिसाव्या शतकामध्ये मात्र महाबळेश्वरचे रूप पालटले, ते ब्रिटीश अधिकारी जनरल लोड्विक यांच्या आगमनाने. साताऱ्याच्या राजाकडून येथील सृष्टिसौंदर्याचे वर्णन ऐकल्यावरून जनरल लॉडविक याने १८२४ मध्ये या भागाची पायी फिरून पाहणी केली. त्यानंतर आपले अनुभव कथन करणारे, येथील सुंदर निसर्गाचे वर्णन करणारे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवापालट म्हणून हे ठिकाण अतिशय योग्य असल्याचे पत्र त्यांनी ‘बॉम्बे कुरियर’ या वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध केले.१८२६ मध्ये जनरल ब्रिग्ज याने येथे एक कुटी उभारली व साताऱ्याच्या महाराजांना साताऱ्यापासून येथपर्यंत रस्ता बांधण्यास प्रवृत्त केले. १९२५ साली कर्नल ब्रिग्स यांनी महाबळेश्वरला भेट दिल्यानंतर भारतामध्ये निरनिराळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या युरोपियन मंडळींच्या करिता विश्रांतीस्थळ येथे बनविण्याची कल्पना त्यांना सुचली. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कर्नल ब्रिग्स यांनी सातारकर छत्रपतींची भेट घेऊन महाबळेश्वरपर्यंत सहज पोचता येणे शक्य व्हावे यासाठी चांगला रस्ता बांधाविण्यासाठी त्यांना राजी केले. १८२६ साली ब्रिग्स स्वतः महाबळेश्वर येथे येऊन राहिले आणि स्वतःसाठी त्यांनी येथे लहानसेच पण आरामदायी कॉटेज बांधवून घेतले. आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर ब्रिग्स यांनी महाबळेश्वरचे इतके सुंदर वर्णन केले होते, की १८२८ साली तत्कालीन ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ असलेले सर जॉन माल्कम यांनी ही या हिल स्टेशनला आवर्जून भेट दिली. सर माल्कम यांना हे ठिकाण इतके पसंत पडले, की महाबळेश्वर आपल्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी छत्रपतींना राजी केले आणि त्या बदल्यात त्यांनी छत्रपतींना वाई देऊ केले. सर माल्कम यांना महाबळेश्वर बद्दल वाटणारी आपुलकी राजांना माहिती होती, त्यामुळे सर माल्कमच्या प्रस्तावाला राजांनी मंजुरी दिलीच, पण त्याशिवाय गावातील मध्यवर्ती पेठेला सर माल्कम यांचे नावही दिले. आजतागायत महाबळेश्वरमधील मध्यवर्ती पेठ ‘माल्कम पेठ’ या नावानेच ओळखली जाते. १८२७ मध्ये मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम याने येथे युरोपीय सैनिकांकरिता एक रुग्णालय बांधले. १८२८ मध्ये मॅल्कम पुन्हा येथे आला. येताना त्याने डॉ. विल्यम्सन याला आणले आणि येथील हवामानाच्या परिस्थितीचा अहवाल त्याची येथेच नेमणूक केली. सरकारकडून भाजीपाला उत्पादनात चिनी गुन्हेगारांचा उपयोग करून घेण्यात येऊ लागला. काही कालावधीतच एक प्रसिद्ध गिरिस्थान म्हणून माल्कमपेठ (महाबळेश्वर) भरभराटीस आले.
१८२९ साली महाबळेश्वर हे ‘बॉम्बे प्रेसिडन्सी’चे ‘समर कॅपिटल’ असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. सरकारी कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटीश सरकारच्या आर्थिक मदतीने अनेक मोठ्या सार्वजनिक इमारतींचे निर्माण येथे केले गेले. महाबळेश्वरमध्ये जसजशा सोयी उपलब्ध होत गेल्या तशा अनेक नामांकित पारशी व्यापाऱ्यांनी येथे जमिनी खरेदी केल्या. याच व्यापाऱ्यांच्या आर्थिक सहाय्याने महाबळेश्वर मध्ये प्रवाश्यांसाठी धर्मशाळा आणि एक मोठे इस्पितळही उभे राहिले. आजच्या काळामध्ये ही या इमारती, आणि सुंदर टुमदार बंगले या गावाची शोभा वाढवीत आहेत. कोळी, धनगर, धावड व कुळवाडी या येथील मूळच्या जमाती आहेत. चिनी व मलायी कैदी ठेवण्याकरिता येथे १२० कैदी राहतील एवढा कैदखाना बांधण्यात आला होता. येथील कैद्यांनी बटाट्याची व विलायती भाजीपाल्यांची लागवड ऊर्जितावस्थेत आणली. १८६४ मध्ये हा कैदखाना बंद करण्यात आला. १८३४ ते १८६४ या काळाच्या दरम्यान ब्रिटीशांच्या कैदेमध्ये असलेल्या मलाय आणि चीनी कैद्यांना कामाला लावून ब्रिटीशांनी महाबळेश्वरमध्ये बटाटे, इतर भाज्या आणि स्ट्रॉबेरीची लागवड सुरु करविली. हे कैदी येथून स्थलांतरित झाल्यानंतर स्थानिक लोकांनी या बागा आपल्या ताब्यात घेऊन भाज्यांची लागवड सुरु ठेवली.
स्ट्रॉबेरीची शेत
स्ट्रॉबेरीचे फळ
रासबेरी,गुजबेरी,मलबेरी
अशा रीतीने महाबळेश्वरची खासियत असेलेली स्ट्रॉबेरीची लागवड येथे सुरु झाली.१८२८पासून सर जॉन माल्कम, सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आर्थर मॅलेट, कर्नाक, फ्रेरे आणि अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली होती. १८८४मध्ये राजभवन बांधण्यात आले. मुंबई इलाख्याची उन्हाळी राजधानी म्हणून येथून कारभार चालत असे. पूर्वी पर्यटक पावसाळा सोडून यायचे. उन्हाळी व हिवाळी असे पर्यटनाचे दोनच हंगाम होते; मात्र आता पावसाळ्यातही (अतिवृष्टीचा काळ सोडून) पर्यटक गर्दी करतात.महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी,लाल मुळे,गाजरे मध व गुलकंद तसेच चने,चिक्की,मक्याची कणसे पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.
क्षेत्र महाबळेश्वर :-
जुन्या महाबळेश्वराला धोम महाबळेश्वर असेही जुन्या महाबळेश्वराची उंची ४३८५ फूट आहे. येथील डोंगरातून ७ प्रवाह बाहेर वाहात येतात. त्यांत शिवलिंगे आहेत. या सात प्रवाहांना कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी, सरस्वती अशी नांवे आहेत. या सर्व नद्यांचे पाणी एका कुंडांत एकत्र आले असून त्याला ब्रह्मकुंड असे नाव आहे. तेथून ते दुसर्या एका कुंडात सोडले आहे. पाण्यातील लिंगावर १४ हातांची एक ताम्र गजाननाची प्रतिमा आहे. या मंदिराला पंचगंगा मंदिर म्हणतात. येथे रुद्र, चक्र, हंस, पितृमुक्ति इ. तीर्थे आहेत. हे मंदिर इ. स. १२१५ यादव घराण्यांतील सिंघण देवाने बांधले. पुढे त्यांची दुरुस्ती वेळोवेळी शिवाजी महाराज, चंद्रराव मोरे, शाहू महाराज यांनी केली. शिवाजी महाराजांनी देवळास तीन सोन्याचे कळस दिले होते. अहिल्याबाईने केदारेश्वराचे मंदिार बांधले. बारा वर्षाच्या तीर्थयात्रेनंतर समर्थ येथेच प्रगट झाले. ते येथे दोन अडीच महिने होते. पहिला मारुती त्यांनी येथेच स्थापन केला. येथून समर्थ कृष्णेच्या काठाकाठाने वाई, माहुली करीत कर्हाडपर्यंत गेले.
येथे गोपाळभट महाबळेश्वरकर नावाचे एक सत्पुरुष राहात होते. शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मातुश्रींनी त्यांच्याकउून गुरुपदेश घेतला होता. महाराजांनी त्यांना वर्षासन दिले होते. ते सूर्यापासक होते. ६-१-६५ ला येथे शिवाजी महााजांनी आपल्या मातुश्रींची व एकनिष्ठ वृध्द माननीय सल्लागार सोनोपंत डबरी यांची सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण तुला केली. किती सोने लागले त्याचा उल्लेख नाही.१६५७ अखेर दिवाकर गोसावी यांनी बहिरभटांमार्फत मंदिराची दुरुस्ती केली. सवाई माधवराव हा एकच पेशवराव १४-१०-१७९१ रोजी येथे आला होता. त्याच्या बरोबर मॅलेट व प्राईस हे दोघे इंग्रज होते.
कृष्णामाई मंदिर :
महाबळेश्वर येथील पंचगंगा उगम व महाबळेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या भरपूर; पण या दोन देवळांया अगोदर बांधलेल्या मूळ कृष्णामाई मंदिराची ओळख करून घेऊ. कार पार्किंगच्या पूर्वेस साधारण पाच ते १० मिनिटांत चालत येथे पोहोचता येते. हे देऊळ फारसे परिचित नाही. अलीकडे आठ-दहा वर्षांत पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. हे देऊळ कोणी बांधले याची निश्चित माहिती नाही; पण साधारण ११व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचे बांधकाम असावे. या मंदिराची शैली परिचित नाही. येथे स्मशानभूमी होती. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता येथून स्मशानभूमी हलविली आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला विष्णू, तसेच गरुडध्वज दिसून येतात. वास्तविक विष्णूची प्रतिमा स्मशानाजवळ आढळत नाही. देऊळ वापरात नसल्यामुळे येथे स्मशान झाले असावे. आतील गोमुखातून पाणी पडत असते.समोरील नंदीच्या मूर्तीची शैली खूपच वेगळी आहे. त्याला कोणतेही अलंकार दिसत नाहीत. आतील बाजूस असलेले शिवलिंग एका चौकोनी स्तंभावर आहे. याच्या खालील बाजूस १०८ नाग दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील भाग खुला आहे. साधारण १७ मार्च ते २३ मार्च व १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत येथे संपूर्ण गाभाऱ्यात सूर्यकिरणे पडतात. समोरच कृष्णा खोऱ्याचे दूरपर्यंतचे विंहंगम दृश्य दिसते. मंदिराची शिखरबांधणी पावसाचा मारा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. लांबून मंदिराची कल्पनाही येत नाही. कृष्णा नदी येथूनच आपला प्रवास सुरू करते.
मूळ कृष्णामाई मंदिर
कृष्णामाई मंदिर - गरुडध्वज
पंचगंगा मंदिर :
महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. सुमारे ६०० वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस लाखो भाविक क्षेत्र महाबळेश्वरला भेट देतात. पंचगंगेचे मंदिर १७व्या शतकात बांधण्यात आले या ठिकाणी पाच नद्यांच्या मूळधारा उगम पावतात. कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी भागीरथी कृष्णेस भेटावयास येते तर दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटावयास येते.आता ती २०३४मध्ये दिसेल, तर भागीरथी १२ वर्षांनी श्रावण महिन्यात येते. ती आता २०२८मध्ये प्रकट होईल. कृष्णा, कोयना आणि वेण्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. सरस्वती पश्चिमवाहिनी आहे. या नद्यांचे एकत्रित मंदिर बांधलेले आहे. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वाहत असतो.
हे पाच नद्यांचे प्रवाह कलाकृतीतून उगम स्थानांना एकत्र करुन ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात, शेजारी विष्णू कुंड ही आहे.
पंचगंगेच्या मंदिराबाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर व रुद्र्तीर्थ मंदिर भग्नावस्थेत आहेत. पंचगंगा व महाबळेश्वर मंदिरादरम्यान अतिबलेश्वर मंदिर आहे त्यासमोर हंसतीर्थ होते असे सांगतात.
महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पहाण्यास तर सर्वजण येतात पण तेथील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या क्षेत्र महाबळेश्वरला आपण जरूर भेट द्यायला हवी.
महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. तसेच येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे.
महाबळेश्वर मंदिर :
महाबळेश्वर या मंदिराच्या नावामुळेच या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडलं असावं. येथील महाबळेश्वराचे मंदिर हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. महाबळेश्वर मंदिरातील शिवलिंग स्वयंभूखडकातून असून रुद्राक्षकृती खाचखळग्यातून सतत पाणी वाहत असते. शिवलिंग असला तरी या ठिकाणी पिंडी नाही. या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीबरोबरच सुमारे तीनशे वर्षापासून भगवान शंकराची शेज, डमरू आणि त्रिशुळ देखील ठेवले आहे. असं मानले जातं की, भगवान शंकर येथे रात्रीस निद्रा घेतात आणि रोज सकाळी त्यांच्या शेज विस्कटलेल्या अवस्थेत असते. येथील मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून ३ कि.मी.अंतरावर असलेला वेण्ण नदीचे पाणी साठलयाने निर्माण झालेला वेण्णा लेक हे महाबळेश्वर मधील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाण आहे.चारी बाजूंनी हिरव्यागार वनराईने नटलेल्या या तलावाची सुंदरता शांत व नितळ पाण्याने आणखी वाढते.सन १८४२ साली सातारचे राजे श्रीमंत छ.आप्पासाहेब महाराज यांनी त्याकाळी महाबळेश्वरच्या पिण्याच्या पाण्यासाठी या लेकची निर्मिती केली.हे लेक बारमाही वाहणाऱ्या झर्या मुळे काठोकाठ भरलेले असते.वेण्णा लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात होता. त्यानंतर दोन वेळा त्याची पुनर्बांधणी झाली. नुकतीच धरणाची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविली आहे. आता पाचगणीलाही या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी याची निर्मिती झाली. महाबळेश्वरचा प्रसिद्ध बोट क्लब येथेच आहे. पर्यटकांनी कायम गजबजलेले हे ठिकाण वाई-महाबळेश्वर मार्गावरच आहे. दाट जंगलाच्या सान्निध्यातील नौकानयन ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. या लेकच्या परिसरात उद्यानाची निर्मिती केलेली असून हिरवळ व विविध फुलांचे ताटवे फुललेले असतात.छायाचित्रण करण्यासाठी हा परिसर उत्तम आहे. घोड्यावरुन रपेटही मारता येते. या तलावाच्या मागे घनदाट अरण्यही आहे. तर शेजारी रस्त्याला लागूनच प्रतापसिह उद्यान आहे. तेथे अनेक शोभिवंत फुलझाडे आणि वृक्ष आहेत.
तलावामध्ये नौकाविहाराची सोय असून एक तासाला ४०० रु.मध्ये आपण तलावाच्या शांत पाण्यात नौकानयन करू शकतो.याच बरोबर घोडेस्वारी,मेरी-गो-राउंड,झोपाळे,विविध खाद्यपदार्थ यांचाही आपण आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
आता महाबळेश्वरच्या पाँईटची माहिती घेउया.
केट्स पॉइंट (नीडल होल/एलिफंट पॉइंट) :
वेण्णा लेकच्या पुढे पाचगणी रस्त्याच्या बाजूला थोडे अंतर गेल्यावर डावीकडे या ठिकाणाकडे जाण्याचा रस्ता आहे आहे. दाट झाडीतून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून क्षेत्र महाबळेश्वरलाही जाता येते. पुढे आल्यावर दिसते ते कृष्णा नदीचे लांबवर पसरलेले खोरे. त्यात धोम धरणाचा व बलकवडी धरणाचा निळाशार जलाशय. समोर दिसतो झाडीतून डोकावणारा कमळगड. त्याच्या पायथ्याशी आहे जिवा महालाचे कोंडविली गाव. बाजूने हा पॉइंट हत्तीच्या मस्तकासारखा दिसतो, तर नैसर्गिक आरपार दिसणारे ‘नीडल होल’ही दिसतो. याच पॉईंटला मुळ नाव होत 'नाकेखिंड'.मुंबईचे गव्हर्नर जॉन माल्कम यांची मुलगी केट हिला नाकेखिंड परिसर फार आवडला म्हणून या पॉईंटला नाव पडल 'केटस पॉईंट'.याच्याच बाजुला उभे राहिले कि समोर कडा असल्याने आपण जे बोलतो त्याचा प्रतिध्वनी एकु येतो म्हणून तो एको पॉइंट.या केटस पाँईंटचा एक दगड सुटा झाला आहे,पण तो खाली दरीर न कोसळता तसाच उभा राहीला आहे.त्यावर बांधकाम करुन गॅलरी केली आहे.याचा आकार सुईच्या नेढ्यासारखा दिसत असल्यामुळे हा नीडल होल पॉईंट असे म्हणतात. तसेच लांबून पहिले तर हा भाग हत्तीच्या सोंडे प्रमाणे दिसतो.इथून खाली दरीत उतरुन थेट खालच्या गोळेगावात उतरता येते, मात्र हे साहस धाडशी तरुणांनी करावे,कारण वाटेत दाट झाडी आहेच पण त्यात आस्वल, गवे यांचे भय आहे. समोर उत्तरेला जोझाडीभरला डोंगर दिसतो आहे तो कोल्हेश्वर.इंग्रजांनी या कोल्हेश्वरला थंड हवेचे ठिकाण बनविण्याचा घाट घातला होता,पण इथे रस्ता होउ शकला नाही, म्हणून तिथला अनवट निसर्ग टिकला.
कॅनॉट पीक पॉईंट -
या पॉईंट वरून वेण्णा तलाव व कृष्णा खोऱ्या चे आकर्षक असे दृश्य दिसते. खालची हिरवळ तर जांगलसदृष्य आहे.कॅनॉट पीक हा पॉईंट महाबळेश्वरचा दुसर्या क्रमांकाचा उंच पोईंट आहे.याला आधी माउंट ऑलिंपिया म्हणून ओळखले जात असे मात्र नंतर ड्युक ऑफ कॅनॉट्ने इथे भेट दिली व या पॉईंटचे नामकरण कॅनॉट पीक झाले.हा पॉईंट समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंच घेतले.इथून प्रतापगड आणि कृष्णा खोर्याचे नयनरम्य दृष्य दिसते.सुर्योद्य बघण्यासाठी ट्रेकर मंडंळीसाठी हि आदर्श जागा,
हंटर पॉईंट -
कॅनॉट पीक फट्या पासून अगदी जवळ हंटर पॉईंट कडे जाणारी पायवाट आहे. या पॉईंट वरून चित्तवेधक असे कोयना खोऱ्याचे दर्शन होते.
रोझमंड रॉक - बर्थ डे रॉक - मारबिया पॉईंट -
पाचगणी पासून ६ की. मी. अंतरावर रोझमंड रॉक व बर्थ डे रॉक हे पॉईंट आहेत. पाचगणी रस्त्या पासून दक्षिणेला मारबिया पॉईंट असून येथून वेण्णा नदीच्या खोऱ्या चे दृश्य दिसते.
विल्सन पॉईंट:-
महाबळेश्वर मधील महत्वाचा व १४३९ मीटर उंचीवर असलेला पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्याचा आसमंत दिसतो. दुसर्या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते.
सन १९२३ ते १९२६ च्या कालावधीत मुंबई प्रांताचे राज्यपाल असणारे सर लेस्ली विल्सन यांच्या नावाने या पॅाईंटला ओळखले जाते. या पॅाईंट वरून सूर्योदय व सूर्यास्त ही दोन्ही दृश्ये पाहता येतात.महाबळेश्वरच्या परिसराचे नयनरम्य दृश्य इथून पाहायला मिळते.महाबळेश्वर- मेढा मार्गावर असणारा हा पॅाईंट महाबळेश्वर पासून १.५ कि.मी.अंतरावर आहे.सन १९४५ मध्ये सिंदोळा पठारावर युध्द्दकला प्रक्षिशण केंद्र उभारण्याचा विचार होता,मात्र पाण्याच्या अभावाने तो सोडून दिला गेला.विल्सन पॉईंटलाच सिंदोळा हे दुसर नाव आहे.इथे खालीच सातारा-मेढा -मार्गे महाबळेश्वरला येणारा रस्ता व त्यावरचे चेकपोस्ट आहे.तसेच गहु संशोधन केंद्र आहे व गणेशनगर हा भाग आहे.इथे स्वस्तात लॉजिंग उपलब्ध असते.
गहु गेरवा संशोधन केंद्र
विल्सन पॉईंटच्या जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. या रोगापासूप पिकाचे संरक्षण उपाय शोधले जातात.
लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर पासून ६ कि.मी.अंतरावर असणारा हा धबधबा खूप प्रसिध्द आहे.६०० फुट उंची वरून खाली कोसळणारा हा धबधबा जुलै ते डिसेंबर या काळात पाहण्यासारखा असतो.गर्द हिरवाई व स्वच्छ पाणी असणारा हा धबधबा पर्यटकांचा आवडता धबधबा आहे.हे सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. तसेच हा पॉइंट पाचगणी रस्त्याला वेण्णा लेकपासून अत्यंत जवळ आहे. वेण्णा नदीवर हा धबधबा आहे.
मोळेश्वर गावातील वॅक्स म्युझियम :-
महाबळेश्वर -सातारा रोडवर ( केळघर-मेढा मार्गे ) माचुतर नावाचे गाव आहे.इथून द्क्षिणेकडे कासकडे जाणारा रस्ता होतो आहे.हाच रस्ता बगदाद पॉईंटला जातो.या रस्त्यावर मोळेश्वर गावाच्या हद्दीत वॅक्स म्युझियम आहे.म्युझियम तर प्रेक्षणीय आहेच्,पण अंध व्यक्तीनी बनविलेल्या मेणाच्या वस्तु तुम्ही खरेदी करु शकता.या म्युझीयमची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी आहे.मुझियम बघायला साधारण एक तास लागतो.
यानिमीत्ताने आपण भावेश भाटीया यांच्याबध्दल जाणून घेउया.
(फोटोःसनराइज कॅंडल कंपनीचे मालक भावेश भाटीया आणि पत्नी नीता)
'तुला जग पाहाता येत नसले म्हणून काय झाले, अख्ख्ये जग तुझाकडे पाहिल.' या आईच्या वाक्याने अंध भावेशच्या आयुष्यात लख्ख प्रकाश निर्माण केला आहे. आईचे हे वाक्य भावेशच्या आजही स्मरणात आहे. ब्लाइंड (अंध) असतानाही भावेश जगासाठी एक उदाहरण बनला आहे. 15 हजार रुपये कर्ज घेऊन उभी केलेली 'सनराइज कॅंडल' या कंपनीचा तो मालक आहे. भावेश भाटियाच्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 25 कोटी रुपये आहे. सनराइजचे वैशिष्ट्ये सांगायचे तर भावेशच्या कंपनीत काम करणारे सर्व कर्मचारी ब्लाइंड आहेत. 'अंध व्यक्तिना डोळे नसले तरी अंत:चक्षूंनी ते जग पाहू शकतात.' हे भावेशने सिद्ध करून दाखवले आहे.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील रहिवासी भावेशची सनलाइज कंपनी मेनबत्तीचे उत्पादन घेतले जाते. या मेनबत्तीच्या व्यवसायाने भावेशचे नाव देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. भावेशने मोठ्या कठीण परिस्थिती सुरु केलेला बिझनेस यशस्वी करून दाखवला आहे.
भावेशला बालपणापासूनच कमी दिसते. त्यामुळे त्याला विद्यार्थीदशेपासून मोठा संघर्ष करावा लागला. शाळेतील इतर मुले भावेशला आंधळा... आंधळा म्हणून चिडवायचे. या दररोजच्या प्रकाराला कंटाळून त्याने शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आपला निर्णय आईला सांगितला. मुले फार चिडवतात, हेही सांगितले. मात्र, आईने भावेशला मोलाचे मार्गदर्शन केले. आई म्हणाली, त्या सगळ्यांना तुझ्याशी मैत्री करायची आहे. तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, म्हणून ते तुझ्यापासून जरा अंतर ठेऊन असतात. त्यानंतर भावेशमधील आत्मविश्वास वाढला. त्याने सगळ्यांशी मैत्री केली.
भावेशच्या आईला कॅन्सर होता. त्यामुळे तिच्या उपचारात त्यांचा खूप खर्च झाला होता. भावेशने सुरुवातीला हॉटेलमध्ये नोकरी केली. परंतु, भावेशची दृष्टी गेल्यानंतर हॉटेल मालकाने त्याला कामावरून काढून टाकले. त्यात योग्य उपचार न मिळाल्याने भावेशच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले. त्याच्या आईचा मृत्यू झाला.
भावेशला लिहिता-वाचता येत नव्हते. परंतु त्याची आई त्याच्याकडून पाठांतर करून घेत होती. भावेश पोस्ट ग्रॅज्युएट झाला. तोपर्यंत आईने खूप परिश्रम घेतले. मात्र, आपली दृष्टी, आई आणि नोकरी गेल्याने भावेश आतून खूप तुटला होता. मात्र, भावेशला आईच्या त्या एका वाक्याने आज यशाच्या उंचशिखरावर पोहोचवले आहे. 'तुला जग पाहाता येत नसले म्हणून काय झाले, अख्ख्ये जग तुझाकडे पाहिल.' हेच ते वाक्य...
ही जीवन गाथा आहे भावेश भाटिया यांची.
राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आलेले भावेश भाटिया ‘सनराईज कॅन्डल्स’ या उद्योगाचे संस्थापक आहेत. पूर्णत: दृष्टिहीन असूनही त्यांनी निश्चय व मेहनतीच्या बळावर महाबळेश्वरमध्ये एका हातगाडीवर सुरू केलेला मेणबत्त्यांचा व्यवसाय आज ‘सनराईज कॅन्डल्स’च्या माध्यमातून देशविदेशांत पसरला आहे. आज या उद्योगाची कोटींत उलाढाल आहे. आपल्याबरोबरच आपल्या इतर दृष्टिबाधित मित्रांनाही रोजगार मिळावा यासाठी त्यांची कंपनी प्रयत्नशील असते. आज त्यांच्यासोबत हजारो दृष्टिबाधित बंधूभगिनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत शिखरावर पोहोचलेल्या एका शूर योद्ध्याची ही कहाणी आहे. श्री. भाटिया यांना ‘रेटिना मस्क्युलर डिजनरेशन’ नामक आजारामुळे बालपणीच दृष्टी गमवावी लागली... त्यांच्या आईला कर्करोग झाला होता. त्या आजाराशी झुंज देताना अखेर त्यांनीही जगाचा निरोप घेतला... पण, ‘‘तू जग पाहू शकतोस की नाही या गोष्टीने काहीही फरक पडत नाही, पण तू आयुष्यात असं काहीतरी करण्याचा अवश्य प्रयत्न कर, ज्यायोगे हे जगच तुझ्याकडे पाहू लागेल,’’ या आईच्या शिकवणीचं संचित त्यांच्यापाशी होतं. मग त्याच्या बळावर त्यांनी पत्नी नीतासोबत स्वत:चं विश्व असं निर्माण केलं, जे समाजातील सर्वच घटकांसाठी प्रेरणादायी आहे.
बगदाद पॉईंट -
हा पॉईंट पहावयास जायचा तर पायीच जाण्याची तयारी हवी. कारण वाहनाने जाता येईल असा सुस्थितीतील रस्ता नाही. मात्र येथील सृष्टी सौंदर्य पाहताना पर्यटकाला साऱ्या जगाचा विसर पडतो.
महाबळेश्वर बाजारपेठ-
महाबळेश्वर बाजारपेठेमध्ये सायंकाळच्या वेळी फेरफटका मारणे हा पर्यटक म्हणून वेगळाच अनुभव असतो. महाबळेश्वर बस स्थानका पासून मुख्य चौका पर्यंत असलेली ही बाजारपेठ पर्यटकांनी सतत गजबजलेली असते.महाबळेश्वर ची प्रसिध्द स्ट्रॉबेरी,गजर,चने मध,चिक्की,लोकरीचे कपडे,कलाकुसरीच्या वस्तू यांची खरेदी महाबळेश्वर ला आल्यानंतर केलीच जाते.महाबळेश्वर त्याच्या स्ट्राबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच महाबळेश्वर हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यासाठी सुद्धा प्रसिध्द आहे. तसेच आपण जेली, मध, जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता. एखादा हातमाग, चामड्याच्या वस्तू, कोल्हापुरी पादत्राण ई. वस्तू टाउन बझारमधून खरेदी करू शकतो.
हॉलिवुड वॅक्स म्युझियम :-
हे महाबळेश्वरमध्ये जामा मस्जिद रस्त्यावर स्टेट बँकेच्या मागच्या बाजुला आहे.इथे भेट द्यायला साधारण अर्धा तास पुरेसा आहे. हे म्युझीयम खालील वेळेत खुले असते.
Sunday10am - 6pm
Monday10am - 6pm
Tuesday10am - 6pm
Wednesday10am - 6pm
Thursday10am - 6pm
Friday10am - 6pm
Saturday10am - 6pm
Contact +91 84259 05815
बॉम्बे पॅाईंट ,मुंबई पॉईंट :-
महाबळेश्वरच्या पश्चिमेला असणारा बॉम्बे पॅाईंट पर्यटकांमध्ये खूप प्रसिध्द असणारा पॅाईंट आहे.सायंकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक येतात.इथून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य खूपच सुंदर असते.महाबळेश्वरचे काबुली फुटाणे, चिक्की, हंगामाप्रमाणे तुती, जांभळे, करवंदे खात सूर्यास्त होईपर्यंत मजा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉईंट असल्याने याला बॉम्बे पॉईंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. ढगांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.याच पॉईंटला पुर्वी स्कँडल पॉईंट म्हणजे टवाळकीचा अड्डा असे नाव होते.पुढे याला प्रॉस्पेक्ट पॉईंट असेही नाव मिळाले.इथून खाली कोयनेचे खोरे दिसते.तसेच घोड्यावरच्या खोगीराच्या आकाराचा मकरंदगड ही दिसतो.बॉम्बे पॉईंटच्या दक्षिणेला फॉकलंड पॉईंट व कारनॅक पॉईंट आहे तर उत्तरेला लॅडवीक पॉईंट आहे.
कॉरनॉक पॉईंट -
फॉकलांड पॉईंट पासून एक की. मी. वर कॉरनॉक पॉईंट आहे. या पॉईंट वरून कोयना खोर्याचे अतिशय सुंदर दर्शन होते.
फॉकलंड पॉईंट
येथून खोल दरीमधल्या कोयना नदीचे दर्शन होते.तसेच या ठिकाणाहून मावळत्या सूर्याचे दर्शन त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकते.
चायनामन फॉल :
महाबळेश्वर पठाराच्या दक्षीणेला बॅबिंग्टन पॉईंट आणि फॉकलंड पॉईंट यांच्या मध्ये चायनामन धबधबा आहे. पूर्वी चिनी लोकांसाठी असलेल्या तुरुंग परिसरातच हा धबधबा आहे.पावसाळ्यात ५०० मीटरवरुन पडणार्या पाण्याचा आवाज एकायला इथे अवश्य जावे.पाण्याचे दोन प्रवाह एक होउन त्याचा पाणलोट कोयना नदीत मिसळताना पहाणे हा एक अनुभव आहे.महाबळेश्वर बस स्टॅंडपासून अवघ्या २.५ कि.मी.वर हा धबधबा आहे.
बॅबिंग्टन पॉईंट
या पॉईंट वरून मकरंद गड आणि चायानामन धबधबा दिसतो. तसेच कोयना खोऱ्याचेही दर्शन होते. या पॉईंटची उंची समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर आहे.या परिसरात वनस्पतीची विवीधता मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.
नॉर्थकोट पॉईंट -
तापोळा येथून उजव्या बाजूच्या फाट्याने नॉर्थकोट पॉईंट वर जाता येते. येथून कोयना खोऱ्याचे दर्शन होते. तसेच सातारा येथे असणारा अजिंक्यतारा व यवतेश्वर डोंगराचे ही दर्शन होते.
गवळणी पॉईंट -
मारुल गावातून गवळणी तसेच बगदाद पॉईंट कडे जाणारी पायवाट आहे. पायी जावे लागत असल्याने येथे पर्यटकांची गर्दी तुरळक असते. त्यामुळे एकांताची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हा खास असा पॉईंट आहे.
जाण्यास अवघड असल्याने हा पॉईंट दुर्लक्षित राहिला आहे. आर्थर सीट जसा महाबळेश्वरमधील उत्तरेकडील टोकाचा पॉईंट तसाच गवळण पॉईंट दक्षिणेकडील टोकाचा पॉईंट आहे.तापोळा रोडवर 10 कि.मी. पर्यंत गेल्यावर उजव्या बाजूला ‘गवळण पॉईंट’कडे असा बोर्ड दिसतो. त्या रस्त्याने 2-3 कि.मी. गेलो तेथे मारुल नावाचे गाव दिसते.इथूनच सोळशी खोर्याचे दर्शन होते.इथून पुढे चढण आहे.इथे वाट दाट झाडीतून आहे . हा परिसर रमणीय पण रौद्र आहे.पावसाळयात मुळीच जाऊ नये. बरीच वळणे घेत पायवाट अगदी दरीच्या टोकाने वर वर जाते. महाबळेश्वर आणि जावळी तालुक्याच्या सीमेवजवळ असणार्या व दोन दर्यांना जोडणार्या झोळाच्या खिंडीच्या वरील उंच डोंगरावर हा पॉईंट आहे. डाव्या हाताला सोळशी खोरे व उजव्या हाताला कोयना खोरे अशा दोन लांबवर पसरलेल्या खोर्यांचे एकाच ठिकाणाहून विलक्षण दृष्य ही या पॉईंटची खासियत आहे.तापोळा व त्या पलिकडील शिवसागर व त्याला मिळणार्या या दोन नद्यांचा दोन दर्यांतून प्रवास, हया दोन दर्यांच्या मध्ये असलेल्या या डोंगराच्या टोकावरून पाहण्याचे नयनसुख शद्बामध्ये वर्णन करण्यापलीकडे आहे. निसर्गाचा हा देखावा रौद्र आहे. या टोकावरून थोडे खाली उतरले तर झोळाई खिंडीत जाता येते.वाट अवघड आहे. ज्यांना काही खरोखरच ऑफबीट पहायचे आहे त्यांनी गवळणी पॉईंटला जरुर भेट द्या.मात्र इथे जाताना एकटे दुकटे जाण्यापेक्षा गटाने जाणे केव्हाही श्रेयस्कर.
रॉबर्स केव्ह
सध्याच्या या कोरोनाच्या दिवसांत वटवाघळांना कुणी चांगल म्हणणं सोडाच पण त्यांचं साधं नाव जरी काढलं तरी अनेकांना शिसारी येईल. त्याचं कारणही तसंच आहे. कोरोना विषाणू वटवाघळांमधून पसरला, असं म्हटलं जातंय. ते पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही पण इबोला आणि निफा व्हायरसमुळे आधीच बदनाम असलेली वटवाघळं आता आणखी बदनाम झाली आहेत. याबद्दल तज्ज्ञांनी बरंच काही सांगितलं आहे. अनेक समज, गैरसमज आहेत. बरीच शास्त्रीय माहिती पुढे येतेय. पण प्रचंड संख्येने असलेल्या याच वटवाघळांचे एक वस्तीस्थान महाबळेश्वरच्या जंगलात आहे, ते म्हणजे 'रॉबर्स केव्ह' किंवा 'चोरांच्या गुहा'.अर्थात महाबळेश्वरला आलेले गुलछबु किंवा नेमस्त पर्यटक इथे फिरकतही नाहीत.फक्त वटवाघळात रुची असणारे चिकीत्सक किंवा प्राणीशास्त्राचे अभ्यासक सोडले तर या परिसराला सहसा कोणाचे पाय लागत नाहीत.मात्र या वनसंपदेचे महत्व लक्षात घेता महाबळेश्वरमधील ‘चोराच्या गुहे’ च्या जतनाची मागणी होते आहे.
महाबळेश्वरपासून सुमारे सात कि.मी. अंतरावरील मालूसर गावच्या पश्चिमेस ही ‘रॉबर्स केव्ह’ ऊर्फ चोराची गुहा नामक गुहा आहे. ही गुहा नुसतीच ब्रिटिशकालीन म्हणून त्यास महत्त्व आहे असे नाही. मात्र ही गुहा अनेक अनमोल ठेवेची खाणच आहे. सुमारे एक ते दीड कि.मी. लांब असलेल्या या वैशिष्ठय़पूर्ण गुहेची रचनाही वैशिष्ठय़पूर्ण आहे. महाबलेश्वरच्या पश्चिमेच्या घनदाट जंगलात मधेच थोडेसे रिकामे पठार लागते.गुहेचा हा परिसर मोठे पठार मोकळे आहे. या पठारावरून चालत असताना ठिकठिकाणी पाय आपटले असता आवाज येतो. यावरून खालच्या पोकळीचा अंदाज येतो. वर संपूर्ण मोकळे पठार त्याच्या चारी बाजूला घनदाट जंगल व खालून सुमारे १ कि.मी. लांबीची ही गुहा असा हिचा थाट आहे. या गुहेत आजमितीस हजारो वटवाघळे आहेत. या गुहेत पाण्याचे जिवंत झरे असून गुहेचा तळ सदैव पाण्याने भरलेला असतो. ही गुहा आतून गोलाकार व भक्कम दगडांनी गुंफलेली आहे. गुहेला दोन मोठी गोलाकार तोंडे असून सुरुवातीचा तोंडापासून सुमारे २०० मीटरच्या अंतरानंतर मोठा गोलाकार भाग असून यातूनही गुहेत खाली उतरता येते. वरून पठारावरून हेच गुहेचे प्रवेशद्वार असल्यासारखे वाटते. अगदी 10 फुटांच्या अंतरा पर्यंत गुहेची चाहूल लागत नाही. बेसाॅल्ट खडकाच्या आतील बाजूस गोलाकार पद्धतीने ही नैसर्गिक गुहा तयार झाली आहे. या गुहा अशा खडकाच्या खाली , जमिनीला समांतर दूरपर्यंत पसरलेल्या आहेत. या " Rober's cave ( जुन्या काळी चोर, लुटारू चोरीचे सामान यात ठेवायचे .) दुसरे टोक प्रतापगडच्या पायथ्याशी उघडते असे अभ्यासक सांगतात. या गुहेत आत जाण्यासाठी वनविभागाने लोखंडी शिडी लाऊन आपली जबाबदारी पूर्ण केली आहे असा समज करून घेतला आहे. मात्र गुहेचे प्रवेशद्वार आणखी पुढे २०० मीटर गेल्यावर लागते. या गोलाकार भागातूनही गुहेत प्रवेश करता येतो. त्यासाठी या ठिकाणी उंच लोखंडी शिडी ठेवण्यात आली असून त्यावरून निसर्गप्रेमी-अभ्यासकांना गुहेत प्रवेश करता येतो.टिपीकल अमोनिया व कार्बन डाय ऑक्साईडचा वास श्वसननलिकेला दाह निर्माण करत असतो.
पावसाळ्यात ही भली मोठी गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली असते. या गुहेमध्ये अनेक जिवंत झरे असून आजही शेकडो वर्षे होऊन गेली तरीही त्याचा आवाज व त्याचे पाणी अभ्यासकांना पाहावयास मिळते. गुहेत पुढील भागात संपूर्ण अंधार असून गुहेचे शेवटचे तोंड दगड, मातीमुळे बंद झाले आहे. या भागात काही झाडेही उगवली आहेत.
गुहेच्या वरच्या भागात लटकलेल्या वाघळांचा किलकिलाट त्यांच्या ओरडण्याचा आवाज व काजव्याच्या किडय़ासारखे लखलखणारे (चमकणारे) डोळे चकचकत असल्याचे पाहावयास मिळते. सुरुवातीचा काही भाग सोडल्यास संपूर्ण गुहा पाणी, दलदल व लटकलेली वाघळे व अंधार यामुळे या गुहेस भेट देणाऱ्यास आत प्रवेश करता येत नाही.
अनेक विद्यापीठातील प्राणीशास्त्रातील वटवाघळांवर संशोधन करणारे संशोधक या गुहेला नेहमीच भेट देतात. अभ्यासक व जाणकारांच्या म्हणण्यानुसार या गुहेत दोन प्रकारची वटवाघळे असून निसर्गाचा समतोल राखण्याचे मौलिक कार्य ती करत असतात. या गुहेतील वाघळात काही वाघळे कीटक आहारी आहेत तर काही फल आहारी आहेत.ही वटवाघळे राञीच्या वेळी फक्त वासाने पिकलेली फळे खातात व बिया पसरवून जंगलाचा प्रसार करतात. पश्चिम घाटावरील अनेक जंगले फक्त या देवदूतांमुळे टिकून आहेत, हा मानवजातीवर फार मोठा उपकार आहे.
पावसाळा सुरू झाला, हा सारा परिसर विविध रानफुलांनी बहरून जातो. शिवाय परिसरातील जंगलात करवंदे, जांभळं, तोरण आदी फळांच्या रानमेळ्याची झाडे आहेत. याच जंगलात गेळा, भेडा, अंजनी, नरक्या तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच गरम मसाल्याचे पदार्थ असलेल्या वनस्पतींची रोपे आहेत. अशा या ‘रॉबर्स केव्ह’ ऊर्फ ‘चोराची गुहे’ चे जतन करण्याची मागणी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे.
हेल्सन पॉईंट -
या पॉईंट वरून ब्ल्यू व्हॅली चे ( नील खोरे ) सौंदर्य पाहताना मन प्रफुल्लित होते.
लॉडविक व शाह पॉईंट -
महाबळेश्वरच्या पश्चिम बाजुचा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे हा लॉडविक पॉईंट. लॉडविक पॉईंट महाबळेश्वर बस स्थानकापासून ४ कि.मी.लांब आहे आणि समुद्रसपाटीपासून ४०८७ फुट उंचीवर आहे.या पाँईंटला मजेदार भुगोल तर आहेच पण तितकाच रंजक इतिहास देखील आहे.या पॉईंटचे मुळ नाव सिडने पॉईंट होते.त्याआधी त्याला डोमेश्वर असे नाव होते. सन १८१८ च्या वडगाव मावळच्या लढाईत सहभागी असणार्या इंग्रज सेनापती पी. लॉडविक याने सातारच्या महाराजांच्याकडून महाबळेश्वरचे सौंदर्य ऐकून १८२४ च्या उन्हाळ्यात येथे भेट देऊन पहाणी केली.तेव्हा तो सातार्याचा कमांडींग ऑफिसर होता. प्रथम त्याला डोंगराचे एक टोक सापडले म्हणून त्याला त्याचे नांव देण्यात आले. तो एकटाच काठी घेऊन हिंडत असता त्याचा कुत्राही एका चित्त्याने त्याच्या जवळून पळवला. लॉडविकने वर्तमान पत्रातून या ठिकाणावर लेख लिहिले. त्याच्यानंतर सातारचा इंग्रज प्रतिनिधी (रेसिडेंट) सेनापती ब्रिग्ज येथे आला व त्याने स्वत:करता एक इमारत बांधली. तोच येथील पहिला बंगला. त्याने सातारच्या महाराजांना सातारहून येथपर्यंत एक रस्ता बांधण्यास सांगितले. तो रस्ता प्रतापगडावरुन पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. नंतर मुंबईचा राज्यपाल (गव्हर्नर) सर जे. मालकम् याने येथे इंग्रज शिपायांकरता एक आरोग्यधाम बांधले व तो स्वत: येऊन येथे उन्हाळ्यात राहू लागला. त्याच वेळी त्याच्यानंतर येणारा राज्यपाल कर्नल रॉबर्टसन याने आपल्याकरता एक इमारत बांधली.
Hatti-matha point
Lodwick Point
Way towards Lodwick Point
१८२८ च्या नोव्हेंबरमध्ये सर. जे. मालकमने डॉ. विइलिअमसनला मुद्दाम आणून आरोग्यदृष्टीने त्याच्याकडून पाहणी करविली. माऊंट चार्लटवर राज्यपालाकरता खास बंगला बांधण्यात आला व त्याला लेडी मालकमचे नाव देण्यात आले. नंतर छत्रपतींमार्फत मालकम पेठ येथे येऊून राहण्याबद्दल जनतेला विनंती करण्यात आली. छत्रपतींमार्फत वरील रस्ता आणखी वाढवून पारघाटांतून महाडातून रायगड जिल्ह्यातील दासगावपर्यंत नेण्यात आला. हे काम १८३० मध्ये पूर्ण झाले. नंतर पार्शी व्यापारी आले. बटाट्याचे मळे तयार करण्याकरता चिनी कैद्यांना वेठीस धरण्यात आले. हे कैदी बारा जण असून त्यांना पूर्वेकडील इंग्रजांच्या वसाहतींतून आणण्यात आले होते. कैदेचा अवधी संपल्यानंतर ते मुक्त होवून लग्ने करुन त्यांनी येथेच संसार थाटे. छत्रपतींनी वाई तालुक्यातील खंडाळा या गावाबद्दल महाबळेश्वर इंग्रजांना दिले.
१८३१ मध्ये सरसेनापति सर सिडने बेकविथ येथे मरण पावला व तीन हजार रुपये सार्वजनिक वर्गणी गोळा करुन त्याचे येथे एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्याच्यावरील दोन शिलालेख आता अस्पष्ट झालेले आहेत. गरीब लोक हे स्मारक पवित्र समजून त्याला नवस करतात. येथून आग्नेयेस ७०० यार्डावर इंग्रजांची स्मशानभूमि असून येथेही प्रेक्षणीय थडगी आहेत.दरवर्षी गव्हर्नर उन्हाळ्यात येथे येत असे.
महाबळेश्वरकडून प्रतापगड किंवा मुंबईला जाणार्या रस्त्याने निघाल्यावर उजव्या हाताला लॉडविक पॉईंट्कडे जाणारा रस्ता दिसतो. लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंटकडे जाणारा हा रस्ता खूपच उतार असलेला आहे. सुरवातीला गाडी पार्किग साठी जागा आहे. हा रस्ता सायंकाळी 5 नंतर खूपच भीतीदायक आहे कारण वाटेत घनदाट जंगल आहे. शिवाय या परिसरात अनेकदा बिबट्या दिसला आहे.पार्किंगपासून या पॉईंटवर जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. येथे पोहोचल्यावर समोरील डोंगरात प्रतापगड व कोकणात उतरणार्या वाटा दिसल्या. वाटेच्या डाव्या हाताला लॉडविक पॉईंट आहे.इथे ब्रिटीशकालीन स्तंभ आणि त्याच्यावर असणारे इंग्रजी शिलालेख वाचता येतात.इथून दोन शिखरांचा मधुमकरंदगड द्क्षीणेला दिसतो.हा पॉईंट बघून थोडे खाली उतरुन एलेफंट हेड किंवा हत्ती माथ्याकडे जाता येते.याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात.इथे खाली दरीत चंद्रराव मोर्यांचे जावळी गाव दिसते तर समोर प्रतापगड दिसतो. एलेफंट हेड ते प्रतापगड असा ६.५ कि.मी.लांबीचा रोप वे प्रस्तावित आहे.हा पुर्ण झाल्यास अशियातील सर्वात लांब रोप वे असेल.
मधुसागर : मधुसागर ही महाबळेश्वरमधील मध उत्पादक सहकारी संस्था आहे. महाबळेश्वरच्या आसपासच्या गावातील शेतकरी मध गोळा करून येथे जमा करतात. येथे मधमाश्यापालनाचे शिक्षणही दिले जाते. इथे आपल्याला सरकारी दराने उत्तम प्रतिचा आणि खात्रीचा मध मिळतो.शिवाय इतर उत्पादने जसे जॅम्,गुलकंद वगैरे मिळतात.इथेच मागच्या जंगलात मधाची पोळी आहेत.थोड शांत राहून आपण मधमाशांचा दीनक्रम पाहू शकतो.शिवाय मधाच्या पोळ्यातून मशीनच्या सहाय्याने मध कसा काढतात ते पाहु शकतो.क्षेत्र महाबळेश्वरला जाताना वाटेतच हे मध संशोधन केंद्र लागत असल्याने इथे जरुर भेट द्या.
धोबी वॉटरफॉल :
लॅडविक पॉईंट्कडून क्षेत्र महाबळेश्वरकडे निघाले कि डाव्या हाताला जंगलात हा धबधबा आहे.कोयना नदी इथूनच जावळी खोर्यात झेप घेते.मात्र मुख्य रस्त्यापासून हा धबधबा काहीसा आत असल्याने इथे पायवाटेने जावे लागते.तेव्हा माहितगाराशिवाय इथे जाणे योग्य नव्हे.
एल्फिस्टन पॉईंट-
माजोरी पॉईंट च्या दक्षिण बाजूला एल्फिस्टन पॉईंट आहे. या पॉईंट वरून निसर्गदृश्या पाहताना पर्यटक आनंदून जातो. या पॉईंट वरून दऱ्या खोऱ्या , पर्वत रांगांचे दर्शन होते.हा पॉईंट सन १८३० मध्ये डॉ.मुरे एलफिस्टन यांनी शोधला.मुंबई ईलाक्याचे गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिस्टन यांच्या नावावरुन या पॉईंटचे नामकरण झाले आहे.इथून प्रतापगड्,कोयना खोरे आणि इतर पॉईंट्चे पॅनोरमिक दृष्य दिसते.
माजोरी पॉईंट -
सावित्री पॉईंट पासून अगदी जवळ उंच असा माजोरी पॉईंट आहे. या पॉईंट वरून खाली नजर टाकल्यास भीतीदायक वाटते.
मंकी पॅाईंट
ऑर्थर सिट पॅाईंट च्या रस्त्यावर हा पॅाईंट आहे.या पॅाईंट वरून खाली खोल दरीत पाहिले असता,एका मोठ्या खडकावर तीन माकडे समोरासमोर बसली आहेत असे दिसते.यावरून आपणाला गांधीजींच्या तीन हुशार माकडांची आठवण होते.
कॅसल रॉक, सावित्री पॉईंट -
ऑर्थर सीट पॉईंट येथून महाबळेश्वर कडे परतताना कॅसल रॉक नावाचा शिलाखंड आहे. तो चाबुत्र्यासारखा दिसतो. त्यावर उभे राहून अभाळातिल ढग न्याहाळता येतात. येथून पुढे सावित्री पॉईंट आहे. दूरपर्यंत विस्तारलेला , धुक्यात लपेतलेल कोकणचा दाऱ्या खोर्यांचा प्रवेश येथून पाहता येतो.
इको पॅाईंट –
ऑर्थर सिट पॅाईंट,टायगर स्प्रिंग पॅाईंट व इको पॅाईंट हे एकमेकापासून जवळच असून आपण सहज पायी हे तिन्ही पॅाईंट पाहू शकतो.इको पॅाईंट समोर काही अंतरावर वाकडी पर्वतरांग आहे.इथे जर मोठ्याने ओरडले असता त्याचा प्रतिध्वनी(इको)ऐकायला मिळतो.इथून खाली दरीमधील दृश्य खूप सुंदर दिसते.
टायगर स्प्रिंग पॅाईंट
ऑर्थर सिट पॅाईंट पासून जवळच टायगर स्प्रिंग पॅाईंट आहे.या ठिकाणी बारमाही वाहणारा पाण्याचा झरा असून पूर्वी इथे वाघाचे वास्तव्य होते.या पॅाईंट वरून कोकणचे अदभूत दृश्य पाहायला मिळते.गर्द झाडी असलेल्या या परिसरात काही वेळा रान गव्यांचे दर्शन होते.याला मराठीत गायत्री टाक असे नाव आहे.
ऑर्थर सीट व विंडो पॉईंट -
महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पॅाईंट असून सर ऑर्थर यांच्या नावाने ओळखला जातो.ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव देण्यात आले आहे. आर्थर मॅलेट (1806–1888) हा ब्रिटिश ऑफिसर होता. सरस्वती नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, तेथे बाणकोट बंदरात त्याची पत्नी व लहान मूल नौकेच्या अपघातात मरण पावले. त्यांचे थडगे तेथील किल्ल्यावर आहे. हाच आर्थर सरस्वतीच्या उगमस्थानाच्या वर बसून पश्चिमेकडे आपल्या प्रिय पत्नीची आठवण काढत बसे. त्यामुळे या जागेला आर्थर सीट पॉइंट म्हणतात.महाबळेश्वरच्या आग्नेय टोकाला अगदी कड्यावर हा पॉईंट आहे. हा पॉईंट प्रेक्षणीय असा आहे.महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो. पंचगंगा मंदिराच्या मागेच आर्थर सीट पॉइंट आहे. येथून चालतही जाता येते, तसेच गाडीमार्गही आहे. या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारी सावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. मुळात सह्याद्रीची रांग समुद्रसपाटीपासून उंच आहे,त्यावर महाबळेश्वर पठाराची उंची.हि पुर्ण उंची म्हणजे १४७३ मीटर किंवा ४४२१ फूट उंची इथे आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळते.याच पॉईंटचे आधीचे नाव 'मढी महाल' असे आहे.या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे व या जंगलात गवे,अस्वल्,बिबट्या असे हिंस्त्र पशु असल्याने संध्याकाळी पाच वाजल्यानंतर या परिसरात कोणाला थांबु देत नाहीत.हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड ,लिंगाणा ,तोरणा ,राजगड्,कावळ्या किल्ला,मंगळगड उर्फ कांगोरी स्पष्ट दिसतात. ऑर्थर सीट पॉईंटच्या थेट दरीत चंद्रगड दिसतो.उमरठ्,ढवळे गावामार्गे हौशी ट्रेकर्स चंद्रगड पाहून ढवळ्या घाटाने बहिरीच्या घुमटीमार्गे ऑर्थर सीट पॉईंटला येतात.
ऑर्थर सीट पासून खाली २०० फुट अंतरावर विडो पॉईंट आहे. येथे दगडांची खिडकीसारखी नैसर्गिक रचना पहावयास मिळते. या खिडकीतून निसर्गाचे अद्भूत दर्शन घडते
ऑर्थर सीट पोंईंटकडे जाणार्या रस्त्यावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.
महाबळेश्वर बाजारपेठ-
महाबळेश्वर बाजारपेठेमध्ये सायंकाळच्या वेळी फेरफटका मारणे हा पर्यटक म्हणून वेगळाच अनुभव असतो. महाबळेश्वर बस स्थानका पासून मुख्य चौका पर्यंत असलेली ही बाजारपेठ पर्यटकांनी सतत गजबजलेली असते.महाबळेश्वर ची प्रसिध्द स्ट्रॉबेरी,गजर,चने मध,चिक्की,लोकरीचे कपडे,कलाकुसरीच्या वस्तू यांची खरेदी महाबळेश्वर ला आल्यानंतर केलीच जाते.
महाबळेश्वरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
महाबळेश्वर हे उंचावर वसलेले ठिकाण असल्याने इथले वातावरण उन्हाळ्यातही आल्हाददायी असते.उन्हाळ्यामध्ये थंड हवेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वर ला येत असल्याने महाबळेश्वर पर्यटनासाठी सर्वोत्तम कालावधी ऑक्टोबर ते मे असा आहे.जून ते सप्टेंबर या काळात महाबळेश्वर मध्ये खूप पाऊस पडतो.हल्ली वर्षा पर्यटनाकडे लोकांचा कल वाढल्याने पावसाळ्यातही पर्यटक महाबळेश्वर पर्यटकांनी फुललेले असते.
महाबळेश्वरला कसे जावे?
महाबळेश्वर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्या तून तसेच विदेशातून पर्यटक महाबळेश्वरला पर्यटनासाठी येतात.महाबळेश्वर येण्यासाठी सर्वात जलद किंवा स्वस्त पर्याय कोणता हे आपण पाहू.
विमानाने महाबळेश्वरला कसे जावे?
महाबळेश्वर साठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे (१२० कि.मी)व मुंबई (२८५ कि.मी.) हे आहेत .पुणे व मुंबई देश- विदेशातील शहरांशी नियमित विमानसेवेने जोडले गेले आहे.
रेल्वेने महाबळेश्वरला कसे जावे?
महाबळेश्वर हे उंचावरील पर्यटन स्थळ असल्याने इथे लोहमार्ग नाही.सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा हे असून ५० कि.मी. अंतरावर आहे.याच बरोबर पुणे (१२०कि.मी.) कोल्हापूर (१७० कि.मी.) या ठिकाणी देशातील प्रमुख ठिकाणहून रेल्वे ने येता येते.व या शहरातून महाबळेश्वर ला येणे खूप सोपे आहे.
रस्ता मार्गाने महाबळेश्वरला कसे जावे?
महाबळेश्वर हे सातारा,पुणे मुंबई अशा शहरांशी रस्ता मार्गाने जोडले गेले असून तीन घाट रस्ते महाबळेश्वर ला इतर शहरांशी जोडतात.पुणे,मुंबई कडून राष्ट्रीय महामार्गाने येणारे पर्यटक वाई वरून पसरणी घाट मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.कोल्हापूर,सातारा बाजूने येणारे पर्यटक केळघर मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.कोकण भागातून मुंबई-गोवा महामार्गाने येणारे पर्यटक पोलादपूर प्रतापगड मार्गे महाबळेश्वर ला येऊ शकतात.मुंबई,नाशिक,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,बेळगाव,पणजी इत्यादी शहरातून महाबळेश्वर साठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नियमित चालू असतात.तसेच अन्य राज्यातून महाबळेश्वर साठी खाजगी आरामबस नियमित सेवा देत असतात.महाबळेश्वरला प्रवेश करताना पालिकेचा ३० रुपये प्रदुषण कर आहे जो महाबळेश्वरमध्ये प्रवेश करतानाच भरावा लागतो. तर कारसाठी ३० रुपये ( सात दिवसासाठी ) कर आहे.महाबळेश्वर परिसरात फिरताना आपल्या वहानाचे P.U.C. सर्टीफिकेट बरोबर असणे बंधनकारक आहे.अन्यथा दंड होतो.
महाबळेश्वर मधील पर्यटन सुविधा
महाबळेश्वर पर्यटन करण्यासाठी बहुतांश पर्यटक स्वतः च्या वाहनाचा वापर करतात,परंतु महाबळेश्वर मध्ये टॅक्सी सेवा चांगली असून त्याचे दरही वाजवी आहेत.तसेच पर्यटन हंगामामध्ये राज्य परिवहन मंडळा मार्फत महाबळेश्वर दर्शन ही बस दररोज सुटते.
महाबळेश्वर मधील हॉटेल्स
महाबळेश्वर मध्ये राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध आहेत.पंच तारांकित हॉटेल्स पासून मध्यम किंवा कमी बजेट पर्यंतची हॉटेल्स उपलब्ध आहेत.पण पर्यटन हंगाम (ऑक्टोबर ते मे)या काळात हॉटेल्स चे दर थोडे जास्त असतात.
मिनी काश्मीर तापोळा
प्रतापगड :-
हा किल्ला महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे २३ किलोमीटरवर आहे. किल्ल्यावरून सर्वत्र सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगा दिसतात. अत्यंत विलोभनीय असे हे पर्वतराजीचे दर्शन खूप सुखावह वाटते. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३५४५ फूट आहे. १६५६मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली.मोरोपंत पिगळे यांनी हा किल्ला बांधून घेतला. मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग असून, दोन्ही ठिकाणी तलाव आहेत. किल्ल्याला सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. ३० ते ५० फूट उंचीचे बुरुज आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इत्यादी बुरुजांचे अवशेष अद्यापही दिसून येतात, टिकून आहेत. येथे अफझलखानाचा दर्गा आहे. वर दिसणाऱ्या बुरुजाला अफजल बुरुज असे नाव आहे. किल्ल्यावर तुळजाभवानीचे मंदिर आहे. मंदिरातील भवानीमातेची मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. जवळच बालेकिल्ल्यात केदारेश्वराचे मंदीर आहे. त्यावर शिवाजी महाराजांची सदर व जिजामाता वाड्याचे अवशेष दिसतात. प्रतापगडाच्या जवळच कडेलोट पॉईंट आहे. तेथून दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. याकड्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे.
प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी व अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात अफजलखानाचा वध झाला.त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. येथे महाराजांनी अफजलखानाला गनिमी काव्याने संपविले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडावर आले. पेशवाईत नाना फडणवीसांनी येथे सखाराम बापूला काही दिवस नजरकैदेत ठेवले होते. त्याच नानांना दौलतराव शिंदे त्यांच्या मागे लागले त्या वेळी १७९६मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला होता. १८१८च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. ६० वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्यापासून चालत वर जावे लागे. आता गाडी वरपर्यंत जाते. तरीही थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात.
शिवकालिन खेडेगाव
महाबळेश्वरला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. जावळीच्या खोऱ्यातील या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. किल्ले प्रतापगडाला भेट दिल्याशिवाय महाबळेश्वर दर्शन पूर्णच होत नाही. प्रतापगड पाहताना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा डोळ्यासमोर उभी राहते आणि ऊर अभिमानानं भरून येतो. याच ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याला आता भर पडलीय ती शिवकालीन खेड्याची. शिवकाळातील गावगाडा कसा होता, याचं हुबेहूब दर्शन इथं घडतं. त्यामुळं प्रतापगडाची सफर करताना या शिवकालीन खेड्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
प्रतापगडाच्या ३ किलोमीटर अगोदर एक ऐतिहासिक कलाकृती पाहावयास मिळते ज्यामध्ये शिवरायांच्या काळातील स्वयंपूर्ण खेडेगाव पुढच्या पिढीला दाखवण्याचा सुंदर प्रयत्न येथे केला आहे . 'शिवकालीन खेडेगाव ' असं या उपक्रमाचं नाव आहे . नुकतंच येथे भेट दिली . मनभरून तेथिल बारकावे पाहत कसा वेळ सरला कळलंच नाही . येथील जुन्या स्वयंपूर्ण गावातील बारा बलुतेदार, अलुतेदार , सरदार , शेतकरी , स्त्रिया , लहान मुलं , गुरं -ढोरं साकारली आहेत . अशाच गावातील कारागिरांनी पुढे शिवकालीन किल्ल्यांची , आरमाराची , हत्यारांची निर्मिती केली . ती आजही पाहून आपण अचंबित होतो . हे सर्व कारागीर यांत्रिक व स्थापत्य शास्त्राचे अतिशय हुशार अभियंतेच होते यात शंकाच नाही. हे सर्व देखावे , घरं , गांव आपल्याला अलगद इतिहासात घेऊन जातात .हे सर्व पाहून उर भरून येतो आणि हि भेट अविस्मरणीय ठरते .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन जीवनाचे उत्तम प्रदर्शन आहे. या ठिकाणी मुलांना घेऊन नक्की भेट द्या. जुन्या काळात खेळ कसे खेळले जात होते आणि जुन्या काळात लोक कसे राहत होते हे मुलांना समजण्यास मदत होते.
प्रवेश शुल्क – १०० रुपये प्रति व्यक्ती (मार्गदर्शकांसह)
प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या खेड्यात शिवकालीन माणसं, त्यांचं जीवन, राहणीमान, घरं, त्यावेळी केले जाणारे विविध व्यवसाय, या व्यवसायांशी निगडित समाजातील विविध जाती-जमातींचं नियोजन अनुभवायला मिळतं. हा शिवकालीन गावगाडा साकारलाय चंद्रकांत उतेकर या शिवप्रेमीनं. आजच्या आधुनिक पिढीला शिवकालीन जीवन कसं होतं, हे अवगत व्हावं, यासाठी याची निर्मिती केलीय, असं उतेकर यांनी सांगितलं. खुली अर्थव्यवस्था आणि वाढतं शहरीकरण यामुळं गावगाडा लोप पावलाय. बारा बलुतेदार पद्धती संपुष्टात आली. गाव आता पहिल्यासारखा राहिला नाही, असं गाणं प्रत्येक पिढी गात असते. तर शहरात स्थायिक झालेला गावकरी अधीमधी गड्या आपला गाव बरा... असं म्हणत असतो. या पार्श्वभूमीवर या शिवकालीन खेड्याची सफर घडत असेल तर कुणाला आवडणार नाही? तिही शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडासारख्या किल्ल्याच्या पायथ्याशी.
बलुतेदार पध्दतीची पार्श्वभूमी भारतातील गावागावात पूर्वी बारा बलुतेदारी पद्धत होती. गावगाड्याचं आणि देशाचं अख्खं अर्थकारण या बलुतेदारी पद्धतीभोवती फिरत होतं. त्यामुळं गावं स्वयंपूर्ण होती. सुखी, समाधानी होती. खेड्यांत राहणाऱ्या बिगर शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेनं चालत आल्यामुळं त्याला कुलपरंपरागत हक्काचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळंच हे व्यवसाय आणि त्यानुसार त्यांना मिळणारा मोबदला हे प्रत्येक व्यावसायिकाचं वतनी हक्क ठरले. हेच वतनी हक्क ‘बलुतं’ नावानं ओळखले जात. शेतकऱ्यांबरोबरच्या इतर लोकांच्या या परस्परसंबंधांना उत्तरेत जजमानी (यजमानी) पद्धत आणि महाराष्ट्रात ‘बलुतेदारी’ म्हटलं जातं. शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची कामं करणारे, त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे हे ते बलुतेदार. सामान्यपणे पाटील, कुलकर्णी सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’ म्हणून प्रसिद्ध होते.
असं आहे शिवकालीन खेडं
शहरातील मुलांना 'खेडेगाव म्हणजे काय असतं हे कळावं' यासाठी चंद्रकात उतेकर यांनी हे संपूर्णपणं तत्कालीन खे़डं वसवलंय! या खेड्यामध्ये उतेकरांनी अगदी हुबेहूब वाटणारं तत्कालीन समाजजीवन चितारलंय आणि तेसुध्दा बारा बलुतेदार पध्दतीनं. या शिवकालीन खेड्यात प्रवेश करतानाच प्रवेशव्दाराजवळ उभ्या असलेल्या द्वारपालाची मूर्ती आपल्या स्वागतासाठीच उभी आहे, असं भासतं. प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताच कुडाची घरं आपलं लक्ष वेधून घेतात. उतेकरांनी साकारलेल्या गावामधील एका घरात वहाणांच्या पसाऱ्यात आपल्या कामात पूर्णपणे गुंतून गेलेला चांभार चप्पल बनवताना दिसतो. ही चांभाराची मूर्ती पाहिल्यास ती मूर्ती नसून तो खराखुराच हाडामांसाचा माणूस असल्याचा भास होतो. दुसऱ्या घरामध्ये चाकावर मातीला आकार देणारा कुंभारही मडकी बनवण्यात मग्न असल्याचं दिसून येतं. समोरच असलेल्या मचाणावर उभं राहून शेतातील पक्ष्यांना उडवणारा शेतकरी पाहिला की गावाकडची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
माणसं आणि प्राणीही... पूर्वी गावांमध्ये मनुष्याइतकंच प्राण्यांनाही महत्त्व होतं. हत्ती, मेंढरं, गाय, म्हैस, बैल, कुत्रा, बकरी, घोडा यांसारखे प्राणी म्हणजे कुटुंबाचे सदस्य. त्यावेळी या प्राण्यांच्या मदतीनं अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवायचे. हातात काठी आणि खांद्यावर घोंगडं घेतलेला धनगर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या मेंढ्या, कुत्रा पाहून मनात आपसूकच धनगरवाडीची आठवण येऊन जाते. जवळच काही अंतरावरील गोठ्यातील गाय आणि वासरू यांच्या सुंदर प्रतिमा नकळत आपलं लक्ष खेचून घेतात. तर विहिरीवरून कावडीनं पाणी वाहून आणणारा माणूससुद्धा खराखुरा असल्याचा भास होतो.
शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणंच त्याची बायकोही घरात अनेक कामात व्यस्त असते. मग तो स्वयंपाक असो, जात्यावरचं दळण असो अथवा विहिरीवर पाणी भरणं असो, अशी हजार छोटी-मोठी कामं स्त्री करत असते. याचीच प्रचीती आपल्याला तेथील एका घरात जात्यावर धान्य दळणाऱ्या महिलेला पाहून येते. या स्त्रीची प्रतिमा इतकी रेखीव आहे की, जणू आपल्याला त्या जात्यावरील ओवी ऐकल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. तर जवळच असलेल्या दुसऱ्या घरात आपल्या कुटुंबासाठी भाकरी थापण्यात मग्न झालेली महिला आणि तिच्या बाजूलाच चुलीजवळ असलेली मांजर आपल्या कायम स्मरणात राहते. विहिरीवर रहाटानं पाणी भरणारी महिला, तसंच जवळच असलेली तिची चिमुकली यांच्या प्रतिमाही लक्षात राहण्यासारख्या आहेत.
नवीन पिढीला माहिती व्हावी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधारभूत असलेली बारा बलुतेदारीची पद्धत आता हद्दपार झालीय. आपापल्या वाढत्या गरजा आणि अपेक्षा भागवण्याकरता सर्वांनाच शहराकडं धाव घ्यावी लागते. याच कारणांमुळं खेड्यातील पूर्वीचं परस्परावलंबन कमी होत चाललं आहे. पैशाच्या विनिमय-माध्यमामुळंही या पध्दतीवर बराच परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. इथं येणाऱ्या पर्यटकांना या खेड्याच्या माध्यमातून जुनी जीवनपध्दती कशी होती, हे समजावं, याच उद्देशानं हे शिवकालीन खेड वसवलंय, असं उतेकर यांनी सांगितलं.
शिवकालीन पुल, पार :-
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचल्या आहेत. महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना काही सवंगड्यांना हाताशी घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया केल्या नाहीत तर त्यांना दूरदृष्टीसुद्धा होती. महाराजांनी साडेतीनशे वर्षापुर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रावर हल्ला झाला तर तो समुद्र मार्गाने होईल आणि ही दूरदृष्टी खरी ठरली. 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते दहशतवादी समुद्र मार्गाने आले होते. त्यानंतर राज्य सरकारने समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा वाढवली होती.साताऱ्यातील एक पूल छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण या नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध देतो.
मुसळधार पावसाच्या सरी कोसळणारं सातारा जिल्ह्यातलं जावळीचं खोरं. याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर. त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची.
या भागातून प्रवास करणं जिकीरीचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला. 52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला.
या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा.
पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला, तोही एकदम मापात. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. पुरातील पाण्यासोबत आलेलं कोणतंही लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही कल्पना. पुरामुळे कोणता ओंडका आदळला तरी पुलाला कोणताच धोका नाही.
पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखीच. कोरीव काम केलेल्या या पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली, पण हा पूल आजही त्याच दिमाखात इतिहासाची साक्ष सांगत लोकांसाठी उभा आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.
एकीकडे ब्रिटीशांनी बांधलेल्या पुलाची मर्यादा शंभर वर्षांपेक्षा जास्त नाही हे ते स्वतः पत्र पाठवून राज्य शासनाला कळवतात. आपल्या राज्यात बनवलेले अनेक पुल हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्ष झाल्यावर कोसळल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या शिवरायांच्या काळात बांधलेल्या पुलाकडून सरकारनं बोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.
टीप: हा पूल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे कि नाही यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
मधुशिखर व मकरंदगड
मधु-मकरंद गड :
वासोटा आणि प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.च्या १६५६ च्या सुमारास बांधला. मधुशिखर व मकरंदगड असे दोन्ही मिळून मधु-मकरंदगड किंवा मकरंदगड अशी याची ओळख आहे. याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा दिसतो. म्हणून याला सॅडल बॅक असेही म्हणतात. महाबळेश्वरमधून येथे एका दिवसाचा ट्रेक करणे शक्य आहे. महाबळेश्वरवरून प्रतापगडाच्या पायथ्यामध्ये वाडा कुंभरोशीच्या अलीकडे पार गावातून हातलोट रस्त्याने घोणसपूर गावापर्यंत जाऊन तेथून हा ट्रेक करावा. गावातील देवळात राहण्याची व्यवस्था होऊ शकते. ट्रेकर्ससाठी हे नंदनवन आहे. महाबळेश्वरहून सकाळी लवकर निघाल्यास ट्रेक करून संध्याकाळपर्यंत परत महाबळेश्वरला मुक्कामाला येता येते. गडावर आता फक्त भग्नावशेष उरले आहेत; पण येथील निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा व शिवसागर, पश्चिमेला कोकण असे निसर्गाचे सुरेख दर्शन येथून होते. शक्य असेल तर मधुमकरंदगड-कोंडनाळ-बिरमणी हा ट्रेकही करावा. घोणसपूर गावातून मार्गदर्शक घ्यावा. या गडाभोवती जवळचे घनदाट अरण्य पसरलेले असून त्यात हिस्र श्वापदांची वस्ती आहे. गडाच्या माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली मल्लिकार्जुन शंकराचे मंदीर आहे. त्याची दरसाली यात्रा भरते.
महाबळेश्वर्,वाई परिसराच्या माहिती बरोबरच आपण सातारा जिल्ह्याच्या उत्तर्,पश्चिम भागाची पुर्ण माहिती घेतली.आता आपण जाणार आहोत पुर्व भागात.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाची कायम दुष्काळी प्रदेश अशीच ओळख राहिली आहे. पण तिथेही काही आपल्याला भुरळ घालणारी ठिकाणे आणि आपला जाज्वल्य इतिहास जागृत करणाऱ्या वास्तू उभ्या आहेत. काही गावांनी केलेले जलव्यवस्थापन तर वाखाणण्यासारखेच आहे. त्यामुळे दुष्काळी भाग ही ओळख पुसली जाऊन तिथे पर्यटन वाढावे यासाठीचा हा छोटा प्रयत्न.
कोरेगाव :
सातारा-पंढरपूर मार्गावरील एक प्रमुख बाजारपेठ असलेले हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावातून दिल्ली व पंजाबशी घेवड्याचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार चालतो. येथील राजमाला नुकतेच ‘कोरेगाव घेवडा’ म्हणून पेटंट मिळाले आहे. असे म्हणतात, की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेवड्याचे पीक घेण्याबद्दल राजमाता जिजाबाई यांनी सुचविले व घेवड्याचे बीदेखील उपलब्ध करून दिले. आज सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात घेवडा होतो व तो पंजाबात ‘राजमा’ म्हणून प्रसिद्ध आहे. राजमातेने दिलेला म्हणून ‘राजमा.’ साताऱ्यातील कोरेगावमधून कोट्यवधी रुपयांचा राजमा पंजाबला जातो. कोरेगावजवळील भाडळे गावात छोटा गंधर्व यांचा जन्म झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शंकराव जगताप यांची ही कर्मभूमी. त्यांचा जन्म वाघोली या गावी झाला. कोरेगावजवळ कुमठे नावाचे गाव आहे. काही लोकांच्या मते वामन पंडित यांचे येथे निधन झाले. याबाबत अनेक मतभेद असले, तरी याबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे. वाईजवळील भोगाव व सांगली जिल्ह्यामधील कोरेगाव भूगाव येथे त्यांची समाधी आहे, असेही मानले जाते.
सेवागिरी महाराज, पुसेगाव पुसेगाव :
पुसेगावचे मूळ नाव पुसेवाडी असे होते. सेवागिरी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे ठिकाण असून, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे भक्त आहेत. सेवागिरी महाराजांचा जन्म गुजरातमधील जुनागड येथे झाला. तेथे त्यांनी पूर्णगिरी महाराज यांच्याकडे दीक्षा घेतली. पूर्णगिरी महाराजांनी ‘वेदवती तीरी दंडकारण्यात जा, तिथे सिद्धेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे, तीच तुझी कर्मभूमी आहे,’ असा आदेश त्यांना दिला. त्यानुसार ते दक्षिणेत निघाले. पुसेगावचे जोतीराव जाधव, श्रीरंगकाका, बोंबाळ्याचे निंबाळकर, वर्धनगडचे काशीराम मोरे यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यांनी सन १९०५मध्ये त्यांना पुसेगावला आणले. पुसेगावात आल्यानंतर सेवागिरी महाराजांनी लोकांना अध्यात्म व योगाची शिकवण दिली. तसेच सामाजिक प्रबोधनही केले. सेवागिरी महाराजांनी १० जानेवारी १९४८ रोजी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला पुसेगाव येथे समाधी घेतली. तेव्हापासून पुसेगाची रथयात्रा सुरू झाली. हा रथोत्सव प्रसिद्ध असून, लाखोंच्या संख्येने लोक येथे येत असतात. कुस्त्यांचे मैदान, बैलगाड्यांची शर्यत (शर्यतीवर सध्या बंदी आहे) हे येथील एक आकर्षण. संस्थानामार्फत वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. हे ठिकाण सातारा-पंढरपूर मार्गावर असून, फलटण-सांगली येथूनही तेथे जाता येते.
रहिमतपूर :
आदिशाही राजवटीपासून हे ठिकाण प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. तसेच लष्करीदृष्ट्याही याला महत्त्वाचे स्थान होते. ब्रिटिश राजवटीत हे तालुक्याचे ठिकाण होते. नंतर सर्व कचेऱ्या कोरेगाव येथे हलविण्यात आल्या. रहिमतपूर नगरपालिका सन १८५३मध्ये स्थापन झाली. भारतातील जुन्या नगरपालिकांत या नगरपालिकेचा समावेश होतो. डॉ. राजेंद्र शेंडे हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रहिमतपूरच्याच मातीतले. नाटककार वसंत कानेटकर, कवी गिरीश वगैरे मंडळी याचा मातीतील. प्रतापगडला जाताना अफझलखानाचा रहिमतपूर येथे मुक्काम पडला होता. रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात अफझलखानाचा निशाणाचा हत्ती चिखलात रुतून मेला. त्यामुळे अपशकुन झाला, अशी भावना सैनिकांमध्ये निर्माण झाली होती, असे म्हणातात. या ओढ्याला ‘खोल गिरा’ असे नाव पडले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कण्हेरखेडचे स्मारक :-
इतिहासात आणि सध्याही दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले शिंदे (सिंदिया) म्हणजेच ग्वाल्हेरच्या शिदे राजवंशाचे हे मूळ गाव. राणोजीराव हे या घराण्याचे मूळपुरुष. श्रीमंत महादजी शिदे यांचे स्मारक येथे आहे. स्वर्गीय माधवराव शिंदे यांनी १९९८ साली या गावाला भेट दिली. श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे, त्यांच्या आत्याबाई वसुंधराराजे यांनीही येथे भेट दिली आहे. त्यांचा गावाशी संपर्क असतोच.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड गावात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या सोळा शिंदे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले सोळा खांबी स्मारक आहे. गावात सरदार दौलतराव शिंदेंच्या पत्नी बायजाबाई यांची समाधी म्हणजे छत्री आहे, कन्हेश्वराचे सुंदर मंदिर आहे. महादजींनी वाड्याचे बांधकाम सुरू केले पण पानिपतचे युद्ध सुरू झाले आणि ते अर्धवट राहिले. त्यांना वाडा असा बांधायचा होता की त्यावर फडकणारा भगवा थेट सातारच्या राजवाड्यातून दिसला पाहिजे. कण्हेरखेड रहिमतपूरजवळ आहे. सातारापासून साधारण ३० कि.मी अंतरावर आहे.
नेसरीच्या रणमैदानात सरनौबत प्रतापराव गुजरांसोबत , असामान्य शौर्य गाजवणारे सरदार विठोजी शिंदे यांचे सुपुत्र जनकोजी शिंदे. जनकोजींचे सुपुत्र राणोजी यांनी कण्हेरखेड येथे शिंदे घराण्याची स्थापना केली. पानिपतच्या युद्धात फक्त राणोजींचे पुत्र महादजी शिंदे जिवंत राहिले पुढे त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्याला उभारी दिली व साम्राज्य वाढविले. त्यांनी ग्वाल्हेरला शिंदे घराण्याची स्थापना केली.
सरदार महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १७४० च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी सरदार दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. इ.स.१७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजींनी भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
इ.स.१७४५ ते इ.स.१७६१ च्या दरम्यान जो मराठ्यांचा स्वराज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला होता. महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज इ.स.१७४६, फतेहाबाद इ.स.१७४६. मल्हाराव होळकरांच्या साथीने सरदार महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठासाम्राज्याखाली आणली. रतनगढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. इ.स जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
पानिपतच्या युद्धात शिंदेंचे बलिदान म्हणजे न विसरण्यासारखी घटना १४ जानेवारी दिवशी पानिपतावर अनेक मराठा वीर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले.जख्मी अवस्थेतील महादजी उजैनला परतले ते सुड उगवायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुनच! आणि महादजींनी पुन्हा शिंद्यांची नव्या दमाची पलटण उभा करुन दिल्लीची सत्ता काबिज केली.नजीबाची कबर फोडुन त्याची हाडे इतस्ततः फेकून दिली. दत्ताजी शिंदेंसहीत १६ मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला! अमर झाला !त्यातील १६ वीरांची नावे पुढीलप्रमाणे
०१.जय्यापाराव शिंदे ०२.दत्ताजी शिंदे ०३.तुकोजी शिंदे ०४.ज्योतिबा शिंदे ०५.जनकोजी शिंदे ०६.साबाजी शिंदे ०७.बयाजी शिंदे ०८.धारराव शिंदे ०९.येसाजी शिंदे १०.जीवाजी शिंदे ११.संभाजी शिंदे १२.हणमंतराव शिंदे १३.फिरंगोजी शिंदे १४.मानाजी शिंदे १५.रवलोजी शिंदे १६.आनंदराव शिंदे
आजही कण्हेरखेडमध्ये गेलात तर या सोळा योध्यांची सोळा खांबी स्मृतीस्थळ आपणास पहावयास मिळेल.
हेच 16 स्तंभी पवित्र स्मृतीस्थळ.
कल्याणगड :
कोरेगावपासून १३ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. याला नांदगिरीचा किल्ला म्हणून ओळखतात. शिलाहार राजा दुसरा भोज याने १२व्या शतकात हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने इ. स. १६७३मध्ये तो जिंकून घेतला. मराठेशाहीत नांदगिरी हे येथील परगण्याचे मुख्य ठाणे होते. कल्याणगड चढताना अर्ध्या वाटेवर पाण्याचे टाके लागते. गडाला उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. मुख्य दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत जाते. याच गुहेला पारसनाथ गुहा अथवा दत्त गुहा असे म्हणतात. परंतु जिवंत झऱ्याचे पाणी भरल्यामुळे ही गुंफा जलमय झाली आहे. पुढे सुमारे ३० मीटर लांबीचे एक भुयार लागते. या भुयारात कायम गुडघाभर स्वच्छ असे पाणी असते. आतमध्ये नवव्या शतकात स्थापलेली जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. त्याच्याजवळ देवीची मूर्ती आहे. डाव्या बाजूला दत्तात्रयाची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती सुबक आणि रेखीव आहेत. येथे आता पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गाडी रस्ता झाला आहे.
साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:
कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्यातील काही खोल्यांचे बांधकाम सुंदर आहे. या वाड्यात सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कार्यरत आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी (पंत प्रतिनिधींची कुलदेवता) यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. पूर्वेकडे आणखी एक प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणार्या भाविकांसाठी आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे.
मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे.
गाभारा चौकोनी असून त्यात पितळी मुखवटा असलेली देवीची मूती आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते.
मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.
जावे कसे ?
सातार्यावरुन सातारा रोड-नांदगिरीमार्गे किन्हईला जाता येते.
शकुंतलेश्वर मंदिर, वडुथ :-
सातारा -फलटण रस्त्यावर वडुथ हे गाव आहे.गावातून कृष्णानदीच्या दिशेने गेल्यावर शंकुतलेश्वर हे पेशवेकालीन मंदिर पहाण्यास मिळते.
त्रिपुटी :
त्रिपुटी हे नाथसिद्ध श्री गोपाळनाथ महाराजांच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेले गाव आहे. या ठिकाणी गोपाळनाथांची समाधी व मठ आहे. गोपाळनाथांनी ‘वेदान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या हैबती नावाच्या शिष्याने ‘नाथलीला विलास’ हा ग्रंथ लिहून त्यामध्ये गोपाळनाथ यांचे सविस्तर वर्णन केले आहे. येथे एक सुंदर बांधीव तलाव आहे. तो तलाव ब्रह्मेंद्रस्वामींनी बांधला असावा असे सांगितले जाते.
निढळ :
सातारा-पंढरपूर मार्गावरील हे गाव आदर्श गाव म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर अधोरेखित झाले आहे. गावात अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. कर्तृत्ववान माजी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे हे गाव. त्यांच्या पुढाकाराने गावात अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. वर्धनगड
वर्धनगड :
शिवशाहीतील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला कोणी बांधला याचा संदर्भ मिळत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. कोरेगावच्या पश्चिमेला सातारा-पंढरपूर रस्त्यावरूनच याचे दर्शन होते. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे, तिचे नाव महादेव डोंगररांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे, त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर हा किल्ला दिमाखाने उभा आहे. बाजूला ललगून व रामेश्वर हे दोन डोंगर असून, यावरून किल्ल्यावर तोफांचा मारा करता येत असे. पाच मे १७०१ या दिवशी मुघलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मुघल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला, की बादशहाने खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. तसेच पावसाळ्यात मुक्कामासाठी हा भाग चांगला आहे. या योजनेस औरंगजेबाने मंजुरी दिली. आठ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन या भागात आला व त्याने वर्धनगडाला वेढा घातला. किल्लेदाराने वाटाघाटीसाठी काही काळ खानाला गुंतवून ठेवले होते. खानाने १३ जून १७०१ रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. २२ जून रोजी मीर ए सामान या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून ६७५ मण धान्य, ४० मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड असे केले. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासात गडावर जाता येते. पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावात शिरताना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गोमुखी बांधणीचे गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून, सुस्थितीत आहे. गडावर अधिष्ठात्री वर्धनी मातेचे मंदिर आहे. बाकी अवशेष नाहीत; पण या किल्ल्यावरून पश्चिमेला अजिंक्यताऱ्यापर्यंतचा प्रदेश, तर पूवेला महिमानगडापर्यंतचा प्रदेश दिसतो.
नेर तलाव :
पुसेगावजवळ उत्तरेस नेर गावाजवळ व्हिक्टोरिया राणीच्या काळात इ. स. १८७३मध्ये या धरणाचे बांधकाम तत्कालीन इरिगेशन डिपार्टमेंटकडून झाले आहे. या तलावाच्या मध्यभागी टेकडी असून, त्यावर चैतोबाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी एक पायवाट आहे. या वाटेचे वैशिष्ट्य असे, की धरणातील पाणी वाढले, तरी रस्ता पाण्याखाली कधीही जात नाही. हा गाळाने भरला होता. अलीकडेच यातील गाळ काढला आहे. त्यामुळे साठवण क्षमता वाढली आहे. या बंधाऱ्यातून खटावच्या काही भागातील शेतीला छोट्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते. येथे जवळ असलेल्या नागनाथवाडीत श्रावण सोमवारी उत्सव असतो. या दिवशी खऱ्या नागाचे दर्शन होते.
चिमणगाव :
पुसेगावकडे जाताना कोरेगावपासून सहा किलोमीटरवर चिमणगाव आहे. या गावात हेमांडपंती शैलीत बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. तसेच समर्थांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध मारुतीपैकी एक मारुती मंदिर येथे आहे. दर वर्षी श्रावण महिन्यातील शनिवारी येथे यात्रा भरते. येथे आता साखर कारखानाही झाला आहे.
वेळू :
अभिनेता आमीर खानच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत साताऱ्यातील ‘वेळू’ गावाने बाजी मारली. ५० लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले; पण हा प्रवास सोपा नव्हता. वर्षानुवर्षे टँकरग्रस्त असलेले हे गाव पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र आले. एकजुटीने गावकऱ्यांनी श्रमदान करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या गावात कुष्ठरोग पीडितांसाठी एक आश्रम काढण्यात आला होता. त्या वेळी या गावाची पाण्याबाबतची अवस्था पहिली होतो. हा आश्रम आता दुसऱ्या संस्थेकडे वर्ग केला असून, तेथे गोपालन संस्था काढण्याचे नवीन विश्वस्तांचे नियोजन आहे. वेळू हे गाव कोरेगाव तालुक्यात असून, रहिमतपूर-औंध रस्त्यावर डावीकडे आतल्या बाजूला आहे.
चवणेश्वर '
सातारा जिल्हयातील कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चवणेश्वर डोंगराला ऐतिहासिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याचा पाया महान तपस्वी च्यवनॠषी यांनी घातलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले हे गाव असून गावच्या पुढील व मागील बाजूस कडा असल्याने इंग्रजी आठ अक्षरात हे गाव वसले आहे. या गावच्या महिला सरपंच म्हणून नीता पवार या काम पहात आहेत.समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंचीवर असणाऱ्या या डोंगरामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. निसर्गरम्य परिसर लाभल्यामुळे या ठिकाणी पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या डोंगरावर पवनउर्जा प्रकल्पाची उभारणी झाल्यामुळे गावच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
सातारा शहरापासुन पुढे २८ मैल चवणेश्वराच्या पायथ्याशी निसर्गाची कृपा व वनश्रीने नटलेले कंरजखोप गाव आहे. गाव लहान आहे वस्ती बारासे ते तीन हजार पर्यंत आहे.या गावातुन चवणेश्वराला रस्ता जातो.गावातील पाटिलकी धुमाळ यांच्याकडे आहे.तर जोशीपण(पुजारी) वाघ यांच्याकडे आहे.गावात बहुतअंशी धुमाळ आहेत इतर लोक थोडे.गावात यायला कच्ची पायवाट आहे.S.T स्टॅन्ड समोर जुनी देवीची विहीर अाहे म्हणे ! किती दुष्काळ पडला तरी त्या विहीरीचे पाणी आटत नाही.दुष्काळात बिचारी एकटी सार्या गावाला पाणी पुरवते तरी पाण्याने भरलेली असते.या गावात दोन प्राचीन व संपुर्ण दगडी शिल्पकृती ने नटलेली दोन मंदिरे आहेत.व इतर अन्य देवळे ही आहेत.श्री रामदासांनी स्थापना केलेला मारुती चे मंदिर गावात प्रवेश करताना सुरुवातीस लागते.श्री.जानुबाई ही गावाची ग्रामदेवता असुन दगडाने बांधलेल्या व शिल्पकृतीने नटलेल्या छोट्याश्या मंदिरात भक्तांसाठी अहोरात्र उभी आहे.देवीची मुर्ती विशाल असुन संगमरवरी दगडाची आहे.देवळासमोर भव्य दगडी दिपमाळ आहे.देवीच्या नवरात्रीत रात्र दिवस दिपमाळ तेवत असते.आधी वाजत घाजत देवळात नवरात्र बसते.दुसरा मान पाटलाचा.तिसरा मान गावात जोशीपण करणार्या ब्राह्मणाचा मग नंतर गावातील सर्व घरात नवरात्र बसवले जाते.कोणी एका बाजुला बसलेल्या बाईने देवळात जाऊन दर्शन घेतले म्हणुन पुर्वीच्या देवीची मुर्ती भंग पावली ती मुर्ती गावच्या विहीरीत विसर्जन करुन त्या जागी नवीन( आताची) मुर्ती बसवली.या देवळात बाजुल्या बसलेल्या बायका सोयर सुतक असलेली माणसे देवळात जात नाहीत.अनेक हात असलेली उभी हसरी देवीची मुर्ती आहे.भक्तजनांचे लक्ष वेधुन घेते.देवीला पायापासुन डोक्यापर्यंत हातात सर्व अयुधे चांदीसोन्याची आहेत.ही देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी भावना आहे.काही जणांना त्यांची प्रचीती येते.या देवळाच्या पुढे चवणेश्वराचे देऊळ आहे.गावातील कोणत्या तरी भक्ता भेटण्यासाठी डोंगरावरील चवेश्वर (शंकराचे रुप ) गावात आला असावा असे सांगितले जाते.शिवाय गावात विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.संपुर्ण दगडाचे प्राचीन शिल्पकृत्तीने नटलेले असे शंकराचे मंदिर आहे.ह्या देवळाविषयी असे सांगितले जाते की पुर्वी हे गाव जंगलमय होते.प्रामुख्याने कंरजी ची झाडे फार होती.अजुनही आहेत.जवळच्या एका गावात एक गरीब धनगर राहात होता.सकाळी उठावे सर्व कामे आटपुन देवाचे नाव घेत झाडे तोडायला जावे.झाडे तोडुन आसपासच्या गावात नेऊन विकावी.मिळेल त्या पैशावर गुजराण करावी.दिवसामागुन दिवस चालले होते.धनगर खांद्यावर कुर्हाड व पंचा जगंलात चालला होता.तो जंगलात पोहचला.एक मोठे कंरजाचे झाड हेरले.व झाडावरती कुर्हाड मारली ती झाडाच्या खोडाशी बसली.व झाडातुन रक्ताच्या चिंकाड्या बाहेर पडल्या.धनगर घाबरुन गेला.ह्या रक्ताच्या चिळकड्या झाडातुन कश्या व का हे त्याला कळले नाही.घाबरलेला धनगर पळत आला व त्याने गावकर्याना ही गोष्ट सांगितली.व तेही घाबरुन गेले.तसेच आश्चर्य वाटले.ते जंगलात आले.त्यांनी मोठ्या पर्यत्नाने झाड पाडले.तो काय आश्चर्य झाडाखाली भव्य दगडी शंकराची पिंड होती.धनगराने मारलेला कुर्हाडीचा घाव त्या पिंडीवर बसला व त्यातुन रक्ताची धार लागली म्हणुन सर्वांनी शंकराची क्षमा मागितली.व ह्या पिंडीवर गावकर्यांनी दगडी कलाकुसरयुक्त मंदिर बांधले.या मंदिरात एकात एक असे तीन सभामंडप आहेत.शेवटच्या सभामंडपात शंकराची पिंड आहे तिच्या मागे पार्वतीची दगडी मुर्ती आहे.देवळासमोर शंकराचे वाहन नंदी ( दोन मुर्ती ) आहेत.नंदिवर अलंकार कोरलेले आहेत.नंदिचे पावसापासुन संरक्षण घेण्यासाठी डोक्यावर दगडी छत आहे.त्याला नक्षीदार चार खांब आहे.अजुनही नागराजाच्या स्वरुपात शंकर गावात वास करीत आहेत अशी भक्तजनांची समजुत आहे.देवळावर दगडी कळश आहे.देवळासमोर मैदानात सहा फुट उंचीची दगडी दिपमाळ आहे.त्रिपुरीपौर्णिमेला रात्र व दिवस दिवा जळत असतो.गावात जोशीपण करणार्या ब्राह्मणाचा दिवा पेटवण्याचा मान आहे.ती प्रथा आजपण चालु आहे. याच करंजखोप गावाच्या मागे चवणेश्वराचा डोंगर आहे,
छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्याची स्थापना करण्यासाठी चवणेश्वरच्या कडया कपाऱ्यातील मावळयांनी छातीचा कोट करुन लढाई जिंकली याची इतिहासात नोंद आहे. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य लढयात भूमिगत झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना चवणेश्वरकरांनी मोठी मदत केली होती. आजही स्वातंत्र्य लढयाच्या आठवणी जुने जाणते चवणेश्वरकर अभिमानाने सांगत आहेत. गावात प्रवेश करतानाच ग्रामपंचायतीचा फलक दिसतो.रस्त्यांच्या दुतर्फा केलेले वृक्षारोपन आणि घटांवर लिहीलेली प्रबोधनात्मक घोषवाक्ये लक्ष वेधून घेतात. तब्बल 110 वर्षापासून अनेक घटनांचा साक्षीदार असणारा येथील पोलीस पाटलांचा वाडाही लक्ष वेधतो. चवणेश्वर मंदिराकडे जातानाच एक मोठे तळे लागते. मंदिराच्या दारात एक मोठी विहीर आणि तिच्या लगतच एक छोटा आड (बारव)आहे. या दोन्ही ठिकाणचे पाणी अत्यंत थंडगार आहे. समोरच भूर्गभातील घडामोडींचे साक्षीदार असणारे दोन मोठे दगड आहेत. या दगडांचे वैश्ष्टिये म्हणजे या दगडांवर छोटया दगडाने मारले असता, धातुवर मार बसल्यानंतर होणारा टणत्कार ऐकू येतो. जवळच दगडात कारेलेले दगडी पात्र आहे.
मंदिराच्या समोर दगडी न्रदी आणि दोन्ही बाजूला दगडी शिल्प कला कोरलेल्या दोन शिळा आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यत दगडी मूर्ती आहेत. गाभाऱ्यात मूळ दगडी खांबांवर अधारीत मंदिर उभे असून त्याच्यावरील कोरीव काम सुदर आहे. मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राचीन दगडी मूर्ती व शिळा आहेत.
भृगृश्रुषींनी कृष्णा काठच्या परिसरात तपश्चर्या केली तर त्यांचे पुत्र असलेल्या च्यवॠषींनी आयुर्वेदामध्ये खूप मोठी मजल मारली. च्यवॠषींनीच या ठिकाणी तपश्चर्या करुन कर्नाटकात जावून समाधी घेतली. चवणेश्वर येथे असताना अनेक वनौषधींचा शोध च्यवॠषींनी लावला. आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्यवनॠषींनीच या ठिकाणी च्यवणप्राशची निर्मिती केली. चवणेश्वरचा झरा आजही शुध्द पाण्याचा झरा म्हणून सातारा जिल्हयात परिचित आहे असे बोलले जाते.हे पाणी तीर्थ म्हणून अनेक भक्तगण आजारी माणसांसाठी घेवून जातात. हे पाणी पिल्याने आजारी माणसाचा आजार दूर होतो. अशी त्यांची श्रध्दा आहे. चवणेश्वर परिसरात उन्हाळयामध्ये फारसा उन्हाळा जाणवत नाही. तसेच येथील हवामान हिवाळयात सुध्दा शरीराला त्रासदायक ठरत नाही. याठिकाणी असलेली ऐतिहासिक गुहा आज इतिहासाची साक्ष देत आहे. या गुहेमध्ये पूर्वी पाच ॠषीमुनींनी गहन तपश्चर्या केली होती. सध्या या गुहेच्या तोंडावर मोठी शीळा बसवली आहे. या परिसरात अशा अनेक गुहा आहेत.
चवणेश्वरच्या डोंगरावर श्री. चवणेश्वर, महादेव, जानुबाई ही तीन मंदिरे असून गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात श्री. केदारेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पांडव कालीन असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी वर्षभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. विशेषत: दर रविवारी, सोमवारी, अमवस्या, पोर्णिमेला याठिकाणी मोठी गर्दी असते.
अश्विन महिन्यातील चौथ्या शनिवार व रविवार येथे वार्षिक यात्रा भरते. गुळुंब, वरखडवाडी, वाण्याचीवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, सोनके, मोरबेंद, हिवरे आदी गावांमधून मानाच्या सासनकाठया याठिकाणी येत असतात. या सासनकाठयांची भेट हेच यात्रेचे मुख्य आकर्षण असते. याठिकाणचे महात्म्य व निसर्गसौंदर्य यामुळे दिवसेंदिवस याठिकाणी येणाऱ्या भविकांची संख्या वाढू लागली आहे. व्यवसायानिमित्त याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होते. तसेच पशुहत्येला पूर्ण बंदी घातली जाते. अनिष्ट रुढी, पंरपरा नाही एवढेच नव्हे तर यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रमही ठेवण्यात येत नाही. भाविक याठिकाणी भेट देत असतात. ते केवळ देवाच्या महतीमुळे.
असे हे शंकराचे मंदिर फारसे माहीत नाही.शेतीतही या गावाने बारामाहि प्रगती केली आहे.अशा या तिर्थक्षेत्राला आवर्जुन भेट द्या. जाल कसे.पुणे ते सातारा बसने.व तेथुन करंजखोप जावे.जवळसे रेल्वे स्टेशन वाठार तेथुन पुढे करंजखोप जाता येथे.
फलटण :-
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथीयांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जात असे. फलटणचे नाईक निबाळकर हे घराणे ७५० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे. मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दिपाबाई व सईबाई या मुली दिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली होती. म्हणजे हिदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले घराणे आहे. फलटण शहरातील श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो.
बाणगंगेच्या काठावर ही ऐतिहासिक नगरी वसली आहे. नदीच्या पलीकडे मलठण भाग आहे. फलटण म्हणजे फळांचे ठिकाण. तंजावर येथे सापडलेल्या कवी परमानंदकृत शिवभारत या शिवचरित्रात ‘फलस्थान’ असा या ठिकाणाचा उल्लेख आहे. येथील हवामान कोरडे असल्याने हे फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आहे. तसा हा भाग कमी पावसाचा. नीरा पाटबंधारे योजना व्हायच्या अगोदर येथे नगदी पिके घेणे शक्य नव्हते. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब १९५२-१९५७ या कालावधीत बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्या वेळी पाटबंधारे खातेही त्यांच्या अखत्यारीत होते. फलटण व आजूबाजूच्या विकासाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने त्यांच्या कारकिर्दीतच रोवली गेली. श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यांच्या पुढाकारानेच चालू झाला. महाराजसाहेब चांगल्या कामांसाठी सढळ हाताने मदत करायचे. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालय, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था यांना भरीव आर्थिक मदत दिली.
फलटणचे श्रीराम मंदिर २२५ वर्षापूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर तीन दिपामाळा आहेत. मंदिराच छ्त शिसवी खांबांवर तोललेल आहे. खांबांना वरच्या बाजूस लाकडी कमानी आहेत. मंदिराच्या बाजूने ३ ते ४ फूट उंचीचे कोरीव काम केलेल्या लाकडी जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक जाळीवर वेगवेगळई नक्षी कोरलेली आहे.गाभार्यात राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती आहेत.
श्री दत्तात्रेयांची श्री रामचंद्रांशी फलटण येथे भेट झाली अशी लोकांची श्रद्धा आहे. फलटणचे निंबाळकर घराणे भारतातील प्रमुख जुन्या राजघराण्यांपैकी. हे ७५० वर्षांपूर्वीचे असून देवगिरीच्या यादव काळापासून अस्तित्वात असलेले असे हे संस्थान आहे. धारच्या परमार राजांवर दिल्लीच्या सुलतानांनी सतत हल्ले केले होते. त्या वेळी निंबराज परमार नावाचे एक राजघराण्यातील पुरुष दक्षिणेत फलटणनजीक शंभूमहादेवाच्या रानात सन १२४४च्या सुमारास येऊन राहिले. निंबराज ज्या गावी राहिले त्यास निंबळक आणि त्यावरून त्यांच्या वंशास निंबाळकर असे नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हे गाव वसविले आणि तेथे ते वतन संपादून राहू लागले. महंमद तुघलकाच्या वेळेस त्यांना ‘नाईक’ हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढे आदिलशाहीत निंबाळकरांचे महत्त्व विशेष वाढले. निंबराजापासून १४वा पुरुष वणंगपाळ ऊर्फ जगपाळराव म्हणून झाला. त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाही. सर्वांत जास्त राज्यकाळ असणाऱ्या जगातील पहिल्या १० राज्यकर्त्यांत फलटण संस्थानच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील श्रीमंत मुधोजीराजे नाईक-निंबाळकर (चौथे) यांचा सातवा क्रमांक येतो. देवगिरीच्या यादवांच्या पाडावानंतर महाराष्ट्रातील अनेक सरदार मुघल, बहामनी सुलतानांच्या वर्चस्वाखाली होते; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल धोरणामुळे बहुतांश सरदार, राजे, जहागीरदार स्वराज्याचे आधारस्तंभ झाले. त्यापैकी फलटणचे राजे नाईक-निंबाळकर घराण्याचे नाव घ्यावे लागेल. फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, अर्थात थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा नातेसंबंधांनी हे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रमुख अंग बनले आहे. या इतिहासाची व वैभवाची साक्ष देत फलटण शहर आजही देशाच्या राजकारणात व समाजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. रामराजे नाईक-निंबाळकर (सभापती, विधान परिषद), संजीवराजे नाईक-निंबाळकर (सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष), रघुनाथराजे नाईक-निंबाळकर (कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती) हे तिघेही बंधू राजकारण व समाजकारणात अग्रेसर आहेत.
फलटणला लागूनच पश्चिमेला खंडाळा तालुका आहे. या तालुक्यात प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते. लोणंद येथे कांद्याची मोठी व्यापारी उलाढाल होत असते. जवळील पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे. वीर येथे नीरा नदीवर धरण असून, यामुळे बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व सांगोला भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. शिरवळ येथे आता पुण्यानंतर अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प साकारत आहेत. शिरवळजवळील शिंदेवाडीमध्ये बौद्धकालीन गुंफा सापडल्या आहेत. शिरवळ येथे पूर्वी किल्ला होता.
फलटण, खंडाळा, माण, खटाव या तालुक्यांचा बहुतांश भाग कायम दुष्काळी पट्ट्यात येतो; मात्र काही भागांत नीरा पाटबंधारे प्रकल्पामुळे सुबत्ता आली आहे. फलटणच्या आसपास औद्योगिक वसाहत झाली असून, साखर कारखाने, कमिन्स इंडिया लिमिटेड, गोविंद दूध यांसारखे प्रकल्पही आहेत. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील पंढरीच्या वारीचे मुक्कामाचे हे प्रमुख ठिकाण आहे. हा भाग पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे. फलटण येथे रेल्वे प्रकल्पाचे काम चालू आहे. भू-संपादन अडचणीमुळे हे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर दक्षिणेकडून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचे अंतर १०० किलोमीटरने कमी होणार आहे.
जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे. फलटण येथे जाण्यासाठी जवळचा विमानतळ पुणे (६० किलोमीटर), जवळचे सध्याचे रेल्वे स्टेशन लोणंद (२९ किलोमीटर) आहे. फलटण येथे राहण्याची, भोजनाची चांगली सोय उपलब्ध आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
जबरेश्वर मंदिर :- फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जबरेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.
जबरेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील)
जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात
महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान
चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या
मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या
मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे,
तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील पिंड
चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस
असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे.
श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील
मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड
आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड
पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना
केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही
वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून,
मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच
फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी,
कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो.
येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले
जात असे.
जाण्यासाठी :- फलटण शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे - फलटण अंतर ११० किमी आहे. सातारा फलटण अंतर ६५ किमी आहे.
श्रीराम मंदिर
श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीश्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती श्रीराम मंदिर :
फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत.
श्री चक्रपाणि प्रभूंचे "श्री आबासाहेब मंदिर", फलटण)
Shri Abasaheb Temple, Phaltan.
फलटण शहरातील हे मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आशी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते.रंभइसा हि श्री चक्रपाणी प्रभु यांची सावत्र आई आणि मावशी होती. चक्रपाणी प्रभु यांची आई जनकाइसा होत्या. चक्रपाणी एक वर्षाचे असताना रंभइसाने त्यांना आपल्या घरी आणले.चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.
Shri Abasaheb Temple, Phaltan
मुधोजी मनमोहन राजवाडा : आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे.
मुधोजी मनमोहन राजवाडा
मुधोजी मनमोहन राजवाडा - मराठा शैली
गुलाबी हॉल
मुधोजी मनमोहन राजवाडा महात्मा गांधी स्मारक निधीला त्यांनी दानपत्र करून दिला; मात्र देखभालीचा खर्च झेपत नाही या सबबीवर महात्मा गांधी स्मारक निधीने मुधोजी मनमोहन राजवाडा परत केला. हा वसा त्यांनी नंतरही सुरू ठेवला. महाराजसाहेबांनी विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञास एक हजार एकर जमीन दिली होती. त्यांच्या दातृत्वाची महती सांगणारी अशी अनेक उदाहरणे आहेत. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील राजेसाहेबांना म्हणाले होते, ‘मी आज एक मुलगा तुमच्या ताब्यात देत आहे.’ हा मुलगा म्हणजे आपल्या अभ्यासपूर्ण ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांची ही कर्मभूमी. अखेरपर्यंत ते मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. रविकिरण मंडळाचे सदस्य कवी गिरीश हेही काही काळ फलटण येथे मुधोजी विद्यालयात अध्यापन करीत होते. फलटण मुक्कामात त्यांनी काही कवितांची रचना केली होती. मुधोजी मनमोहन राजवाडा - दिवाणखाना मुधोजी मनमोहन राजवाडा
मुधोजी मनमोहन राजवाडा : आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे. जुना भाग भारतीय वास्तुकलेचा व त्यातील लाकडी कलाकुसरीचा सुंदर नमुना आहे. सुंदर कडीपाट, नक्षीदार भक्कम दरवाजे, लाकडी तुळया व आधाराचे खांब अशा पद्धतीच्या वास्तू आता यापुढे निर्माण होणार नाहीत. राजवाड्यात निवासी, कार्यालयीन अशा प्रकारची वास्तुरचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या व नवीन आकर्षक फर्निचरने सजविलेले दिवाणखाने येथे आहेत. त्यांना ‘गुलाबी हॉल’, ‘हिरवा हॉल’, ‘बदामी हॉल’, ‘दरबार हॉल’, ‘सुरुच हॉल’, ‘हमखासे हॉल’ अशी सुंदर नावेही दिली आहेत. पॅलेस बांधताना खासगी वापराच्या खोल्या, त्यामध्ये, कोठी, मुदपाकखाना (किचन), देवघर, माजघर, व २४ शयनगृहे अशी रचना असून, संस्थानाच्या कामकाजासाठी कार्यालये, दरबार इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. उजेडासाठी व वारा खेळण्यासाठी अनेक चौकांची खुबीने रचना केलेली आहे. त्यामधे ‘रामाचा चौक’, समारंभासाठी ‘दसऱ्याचा चौक’, ‘देवीचा चौक’, ‘तुळशीचा चौक’, ‘मुदपाक चौक’, ‘पागा चौक’ व ‘नजरबाग’ असे चौक आहेत. त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी असे खोल्यांचे विविध आकारही आहेत. वाड्याचा दर्शनी भागही खूप आकर्षक आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे व चालूही असते; मात्र हा वाडा इतर राजवाड्यांसारखा खुलेआम बघता येत नाही. फलटणच्या राजघराण्याच्या संग्रहात अनेक दुर्मीळ व्हिंटेज कार आहेत. मुधोजी मनमोहन राजवाडा
श्री हरिबुवा समाधी देवस्थान :
सद्गुरू हरिबुवा शके १७९७मध्ये अश्विन शुद्ध द्वादशीला फलटण येथे प्रकट झाले. आसपासच्या भागांत त्यांचे अनुयायी होते. ते अगदी पणदारे येथेही जाऊन राहिले होते. तेथे त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यावर, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज माघ शुद्ध एकादशी शके १८२० (सन १८९८) रोजी सायंकाळी साडेचार वाजता फलटण येथे समाधिस्त झाले. फलटणमध्ये महानपुरा पेठ भागात त्यांची समाधी आहे. महानुभाव मठ : फलटण ही महानुभाव पंथीयांची काशी समजली जाते. महानुभाव पंथातील पंचकृष्णांपैकी तिसरा अवतार ‘चांगदेव राऊळ’ अथवा ‘चक्रपाणी’ यांचा जन्म फलटण येथे झाला व त्यांनी योगसामर्थ्याने देहत्याग करून भडोच येथील हरपाळदेवाच्या मृतदेहात प्रवेश करून नवीन अवतार धारण केला, अशी अनुयायांची श्रद्धा आहे. उत्तर भारतातून अनेक अनुयायी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
गिरवी ग्राम अर्थात दक्षिण वृन्दावन
पुण्यातून फलटण साधारण ११० किमी. आणि फलटण पासून साधारण ८,१० किमी अंतरावर असलेले हे गिरवी गाव.गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या हाताला असलेले हे मंदिर.निरव शांतता, बाहेर मोठा वृक्ष,त्या वृक्षाखाली एक छोटे खोलीवजा मंदिर, ज्यामध्ये देवाकडे पाहत असलेली हनुमंत, नंदी आणि गरुडाची मूर्ती.
मंदिराच्या मागे विहिर असून तिथे पादुका आहेत त्याचे प्रथम दर्शन घेतले जाते.इथे एक विशाल चिंचेचा वृक्ष आणि त्याच्या पायथ्याशी भरपूर पाणी असलेली विहीर.
त्या विहिरीपाशीच एक छोटेखानी मंडप घालून गिरिधराची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकाराच्या पादुका स्थापित आहेत.
समोरच, सकृतदर्शनी एखादा चौसोपी, ऐसपैस वाडा वाटावा अश्या धाटणीचे, चिरेबंदी मंदिर. थोरल्या दरवाजाने आत शिरल्याशिरल्या डाव्या बाजूला एक छोटासा आड, समोर देवळाचे सभागृह आणि थेट गर्भगृह. श्रीकृष्णाची काळ्या शाळीग्रामात साकारलेली मूर्ती. हरि आणि हर, दोहोंना एकात पाहण्याची.खाली चौकोनी पिंड आणि त्यावर साकारलेली हरीची, बासरीवादन करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती,त्याच्या बाजूला दोन गायी, श्रीकृष्णाचे बासरीवादनान ऐकण्यात मुग्ध झालेल्या. बघताक्षणी मनाला भावणारी.
ह्यामागची संक्षिप्त कथा अशी.
साधारण ७०० वर्षांपूर्वी गिरवी ह्या गावात श्रीकृष्णभक्त श्रीयुत. बाबुराव देशपांडे राहत होते. त्यांना कृष्णभेटीचा ध्यास लागून राहिला आणि त्याच ध्यासातून त्यांना समाधिस्थ अवस्थेत गोपालकृष्णाने अमुक अमुक ठिकाणी शाळीग्राम मिळेल असा दृष्टांत दिला. श्रीयुत बाबुराव देशपान्डे यांनी दृष्टांत मिळाल्याप्रमाणे त्या ठिकाणी उत्खनन केले असता, ज्यावर श्रीविष्णूची चिन्हे होती असा हा, भलाथोरला शाळीग्राम प्राप्त तर झाला.
पण पुढचा प्रश्न उद्भवला. त्यांना त्यांच्या मनातील मूर्ती साक्षात साकार करू शकेल असा मूर्तिकार मिळेना. त्यांनी परत गोपाळकृष्णाचा धावा केला.काही दिवसांनी जय-विजय नावाचे दोन मूर्तिकार श्रीयुत देशपांडे यांना येऊन भेटले आणि तुमच्या मनातील मूर्ती बनवून देतो असा दावा केला.पण देवच तो, भक्ताची परीक्षा घ्यायची म्हणून का काय माहित नाही पण ह्या दोन्ही मूर्तिकारापैकी एक थोटा आणि दुसरा आंधळा.दैवी संकेत होताच, होकार देणे हा फक्त उपचार. त्यांना मदत म्हणून श्रीयुत देशपांडे यांनी त्यांच्या दिमतीला म्हणून काही मदतनीस देऊ केले, पण त्या दोघांनी एकांतात काम करण्याची अट कबुल करवून घेतले. पुढील काही दिवस अविश्रांत मेहनत करून साकारलेली मूर्ती बाबुराव महाराजांसमोर ठेवली. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ना?मनातील मूर्ती मूर्त स्वरूपात समोर पाहून श्रीयुत बाबुराव याना अतिव आनंद झाला.
मूर्ती ४ फुटाची, गोपालकृष्ण एका पायावर उभा, दुसऱ्या पायाची आढी घालून तो केवळ अंगठ्यावर टेकविलेला. मूर्तीला कुठेही जोड नाही.मूर्ती सालंकृत, सगळे अलंकार ठसठशीत.दोन्ही हातांची बोटे कोरलेली, त्यामध्ये फक्त लाकडी मुरली ठेवायची. इतके बारीक काम कि तळहातावरील रेषाही स्पष्ट दिसाव्यात.पायाशी दोन्ही गायी तल्लीन होऊन श्रीमुखावलोकन करताना.दर्शनी पट्टीवर चार मानवी आकृती आहेत, त्यामधील दोन ह्या मूर्तिकारांच्या आणि उर्वरित दोन भगवंताचे द्वारपाल जय-विजय यांच्या ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द ईश्वरालाही अभिप्रेत असलेला हरी-हर, हा एकात्मतेचा अविष्कार- हा गोपालकृष्ण चौकोनी शिवलिंगाकारावर- शाळुंका स्वरूपावर- साकारलेला आहे. इतका लोभस बारकाव्यासहित कि थेट श्रीमद भागवतात उल्लेखलेल्या युगंधराची हुबेहूब प्रतिमा दगडावर चितारल्याचा भास व्हावा.
त्यासाठीच बाहेर हनुमंत, गरुड आणि नंदीही विराजमान आहेत.
मूर्ती पूर्ण झाल्यावर श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तिकाराला सन्मानाने जेवणाचे आमंत्रण दिले. तेव्हा दोन्ही मूर्तिकार पाय धुवून येतो म्हणून मागील विहिरीवर गेले ते तिथेच अंतर्धान पावले.भक्ताचे लाड पुरवायचे, भाविकांना दर्शन द्यायची अनंताची इच्छा म्हणून आलेलेअनंताचे दूत, अनंताला घडविणारे अनंत,कार्य झाल्यावर अनंतात अंतर्धान पावले.त्यांची खूण म्हणून त्या विहिरीवर घडवून घेतलेल्या पादुका ह्या नजीकच्या काळातील आहेत. ह्या पादुका स्थापित करण्यामागे श्री जयंतकाका यांना दृष्टांतरुपी प्रेरणा आहे. जणूकाही तो युगंधर त्याला गीतेत अभिप्रेत असलेला ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या प्रसंगातून साकारलेल्या मूर्त रूपाने पुनःश्च सांगायला इथे उभा ठाकला आहे, प्रश्न आहे तो फक्त आपण अंत:र्मुख होऊन जाणून घेण्याचा.जे कोणी सत्पुरुष येथे येऊन गेले, त्यांच्या अनुभूतीप्रमाणे भगवंत त्यांच्या एका जिवलग भक्त- श्री. बाबुराव- यांच्यासाठी - इथे गहाण रुपी राहिला आहे, म्हणून या स्थानाचे नाव गिरवी, जणू नामाघरी पाणी वाहणारा श्रीखंड्या
मोह आवरत नाही म्हणून एक दाखला द्यावासा वाटतो तो महाभारतातील दुर्योधनाच्या आणि अर्जुनाच्या मानसिकतेतील स्पष्ट फरकाचा,साक्षात ईश्वर सामोपचाराच्या गोष्टी करायला आलेला पाहूनही दुर्योधनाचा अहंभाव त्याच्या मुखी वदतो,
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति:
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
आणि दुसरीकडे पराक्रमी तरीही गोंधळलेल्या अवस्थेतील अर्जुन अनन्यभावाने श्रीकृष्णाला शरण जातो.दुर्योधना त्याच्या समस्येचे फक्त प्रतिपादन करूनच थांबला नाही तर त्याच्या समस्येचे समर्थनही करता झाला. समस्या तर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला पण होती. पण तो त्याच्या मनातील समस्या भगवंताला फक्त सांगून थांबला नाही तर त्या समस्येचे निराकरण करण्याचे साकडे हि भगवंताला घालून रिकामा झाला.आपण कोण ते आपण ठरवायचे आहे. तो भगवंत सगळ्यांनाच द्यायला उभा ठाकलाय, प्रश्न एवढाच कि आपला वाडगा सरळ आहे का पालथा?
श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तीची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची सेवा योग्य त्या माणसाला सोपवून ह्या गोपाळकृष्णाच्या पायी समाधी घेऊन आपले जीवितकार्य संपविले. हि समाधी गर्भगृहाच्या खालील तळघरात आहे. ह्या तळघरात काही वेळ विसावलो, एका अनामिक शांततेचा लाभ घेतला. मंदिराच्या उत्तरेस असलेल्या गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पुजार्यांनी सांगितल्याप्रमाणे हे स्थानही जागृत आहे.
मंदिरात साधारण ७५ एक साधकांची सत्संग/साधना होऊ शकेल असा आटोपशीर हॉल आहे, मागेच स्वच्छतागृह आणि पाणी गरम करण्याची सोयही आहे.
माहिती सौजन्य -श्री जयंतकाका देशपांडे.
धुमाळवाडी धबधबा धुमाळवाडी : हा निसर्गरम्य प्रदेश आहे. खासकरून पावसाळ्यात येथील सौंदर्य खूप छान असते. येथे एक सुरेख, छोटा धबधबा असून, एक गुंफाही आहे.दहीवडीवरुन फलटणकडे निघाले कि मोगराळे घाट लागतो.त्या घाटातच हा धबधबा आहे.अर्थात हा प्रदेश तसा पर्जन्यछायेचा,त्यामुळे सहाजिकच हा धबधबाही फक्त पावसाळी.
सीतामाईचा डोंगर :
फलटणच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वताची रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत एक शाखा असून, त्याला महादेवाचा डोंगर म्हणून ओळखतात. यातच सीतामाईचा डोंगर येतो. उत्तर रामायण घडलेले हेच ठिकाण आहे, अशी या भागातील स्त्रियांची श्रद्धा आहे. सीतामाई, लव-कुश व वाल्मिकी ऋषींच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा येथे आढळतात. भारतात सीतेचे मंदिर केवळ येथेच पाहावयास मिळते, असे म्हणतात. माणगंगा व बाणगंगा नद्या येथून उगम पावतात. स्थानिक कथेनुसार त्रेतायुगात प्रभू रामचंद्र दंडकारण्यात वनवासात असताना भगवान दत्तात्रेयांची भेट याच नगरीत झाली, असे म्हणतात. त्राटिकावधाच्या (स्त्रीहत्या) पातकातून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी याच स्थानी अर्धचंद्राकृती बाणाने पाताळातील जल जमिनीवर आणून भगवान दत्तात्रेयांच्या चरणावर घातले व स्त्रीहत्येच्या पातकातून श्रीराम मुक्त झाले. ज्या ठिकाणी बाण मारले, तिथे पवित्र अशी नदी निर्माण झाली, तीच ही बाणगंगा. राम-रावणाच्या युद्धानंतर जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाइलाजाने श्रीरामांना सीतेचा त्याग करावा लागला. त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, की सीतेला दूर कुठे तरी नेऊन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडले आणि तो अयोध्येला निघून गेला. लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडले होते, ते ठिकाण फलटणच्या शेजारी असल्याचे सांगतात. त्या जागेला आजही ‘सीतामाईचा डोंगर’ या नावाने ओळखले जाते.
सौजन्य : Fort Trekkersग्रुपचे अभिजित जाधव व संदेश जोशीसौजन्य : Fort Trekkersग्रुपचे अभिजित जाधव व संदेश जोशी संतोषगड :
या गडालाच किल्ले ताथवडा असे म्हणतात. विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसवण्यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. संतोषगड हा फलटणपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला मध्यम आकाराचा असला, तरी भक्कम आहे. त्याची बांधणी खुद्द छत्रपती शिवरायांनी केली आहे. संतोषगड आपल्याला तीन टप्प्यांत चढावा लागतो. पहिला टप्पा चढल्यावर आपण एका मठात पोहोचतो. या मठाजवळ तीन गुहा असून, त्यात एक तळे आणि एक मूर्ती दिसते. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. वाल्मिकी ऋषींची एक मूर्ती आहे. चढणीचा डोंगर चढून दुसऱ्या टप्प्यावर आल्यावर दोन प्रवेशद्वारांतून जाताना मारुतीचे मंदिर दिसते. मुख्य दरवाज्याचे बांधकाम पूर्णपणे कोसळलेले असून, त्याला लागून असलेली चौकीदाराची खोली मात्र शाबूत आहे. किल्ल्यावर एक मोठा खड्डा आहे आणि त्यातही एक मोठे झाड वाढले आहे. त्यामध्ये एक गुहा दिसते. गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर बालेकिल्ला आहे. तेथे तातोबा महादेवाचे मंदिर पाहण्यासारखे आहे. गडावर अनेक भुयारे व गुहा आहेत. या भुयारांच्या मार्गात पाण्याचा भरपूर साठा आहे.
वारुगड देखावा वारुगड :
महादेव डोंगराच्या रांगेतील हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक टेहळणी किल्ला. सुमारे ३००० फूट उंचीवर हा किल्ला असून, दहिवडी-फलटण रस्त्यावर तोंडले गावाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. जाधववाडा हे वारुगडाच्या पायथ्याचे गाव. येथूनच गडावर जाणाऱ्या पायवाटेची सुरुवात होते. प्रवेशद्वाराची रचना नेहमीप्रमाणेच दरवाजाचे संरक्षण करणारी आहे. दरवाजाची तटबंदी व किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. बालेकिल्ल्याची तटबंदीही मजबूत आहे. किल्ल्यावर पाण्याची दोन-तीन टाके आहेत. समोर सीतामाईचा डोंगरही दिसतो. तसेच संतोषगडावरून सीतामाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते. येथे कारखानीस नावाचे किल्लेदार होते व त्यांच्या दिमतीला रामोशी लोकांची शिबंदी होती. माचीवर भैरोबाचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.
भैरोबा मंदिर, वारुगड टोकेवाडी :
येथे डोंगरावर संतोषा देवस्थान असून, हे ठिकाण तोंडले गावाजवळ दहिवडी-फलटण मार्गावर आहे. येथे भाविकांची गर्दी असते.
संतोषा देवस्थान, टोकेवाडी
माणदेशी परिसराची भटकंती :-
माण आणि खटाव तालुका हा सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग. सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तारलेला हा दुष्काळी पट्ट्यातील भाग आहे. माणगंगा कुळकजाई येथे उगम पावते व भीमा नदीस जाऊन मिळते. या नदीमुळेच माण हे नाव गावाला पडले. या भागाचा ज्ञात इतिहास चौथ्या शतकापासून आढळून येतो. या भागात राष्ट्रकूट, शिलाहार नंतर यादव, बहामनी, विजापूर, मुघल, मराठे आणि अखेरीस ब्रिटिश अशा राजवटी होऊन गेल्या. खरे महत्त्व आले ते यादवांपासून. कोल्हापूरच्या भोज राजांशी लढत असताना सिंधणदेवाने शिंगणापूर येथे छावणी केली होती. यादवांमुळे त्यांचे सरदार या भागाच्या संपर्कात येऊ लागले. देवगिरी राजवटीपासूनच शिंगणापूर हे अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे. निजाम, तसेच विजापूरचा आदिलशहा व मराठे यांच्यामध्ये सतत चाललेल्या कुरघोडीमुळे या भागास खूप महत्त्व आले. शिवाजी महाराजांनी या भागात नव्याने किल्ले बांधले, तसेच जुन्यांचे नूतनीकरण केले. शिखर शिंगणापूर, गोंदवले, पुसेगाव, म्हसवड या श्रद्धास्थानांमुळे या भागाला धार्मिक महत्त्वही आहे. या भागात द्राक्षे, डाळिंबे, पेरू यांचे उत्पादन घेतले जाते. उरमोडी धरणाचे पाणी लवकरच सर्वत्र पोहोचेल. डोंगराळ भागात अनेक ठिकाणी पवनचक्क्या विद्युतनिर्मिती करीत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील सरलष्कर प्रतापराव गुर्जरही याच भागातील. डॉ. शिवाजीराव भोसले, त्यांचे बंधू बॅ. बाबासाहेब भोसले यांच्यासारखी माणसे या भागातीलच. ‘घरात हसरे तारे’ हे गीत लिहिणारे डॉ. द. वि. केसकर म्हसवडचे.
श्री क्षेत्र गोंदवले :
महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज यांचे हे जन्मठिकाण. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ. स. १८४५) या दिवशी झाला. सातारा-पंढरपूर रस्त्यावरील हे ठिकाण आध्यात्मिक अभ्यासाचे प्रमुख ठिकाण आहे. महाराजांनी लोकांना चांगल्या वर्तणुकीची शिकवण दिली. ते स्वतः गुरुशोधार्थ उत्तर भारतात हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकर महाराजांना भेटले आणि त्यांनी त्यांना नांदेडजवळील येहळेगाव या गावी श्री तुकारामचैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार गोंदवलेकर महाराज हे तुकारामचैतन्य यांच्याकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकारामचैतन्यांनी ‘ब्रह्मचैतन्य’ असे त्यांचे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. त्यांच्या आदेशानुसर गोंदवले येथे राहून ते प्रवचन-कीर्तन यांद्वारे लोकांना अध्यात्माची शिक्षण देऊ लागले. श्रीरामभक्ती हा त्यांचा प्रमुख भक्तिमार्ग होता. मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी त्यांनी गोंदवले मुक्कामी देह ठेवला. त्यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी त्यांचे उचित स्मारक उभे केले. महाराष्ट्रात शेगाव संस्थानानंतर या ठिकाणाचे नाव घ्यावे लागेल, एवढी स्वच्छता व शिस्त येथे आहे. रोजचे विनामूल्य अन्नदान आजतागायत चालू आहे. एका वेळेस ५०० लोक टेबल-खुर्चीवर बसून महाप्रसाद घेतात. येथील स्वयंपाकघर, भंडारगृह, भक्तनिवास, समाधीमंदिर, गोशाळा यांचे व्यवस्थापन उत्तम असते. कसे जाल या भागात? गोंदवले, शिंगणापूर येथे जाण्यासाठी सध्याचे जवळचे रेल्वे स्टेशन सातारा (८० किलोमीटर). लवकरच फलटण हे रेल्वे स्टेशन होत आहे. जवळचा विमानतळ पुणे - ११० किलोमीटर. मार्च ते जूनअखेरपर्यंत या भागात कडक उन्हाळा असतो. या भागात हॉटेल्स आहेत; पण संख्या कमी आहे. मुक्कामासाठी सातारा हे ठिकाण चांगले. साताऱ्याहून या भात एका दिवसाची ट्रिप होऊ शकते.
म्हसवड :
सातारा जिल्ह्याचे पूर्व टोक म्हणजे म्हसवड. म्हसवड नगरपालिका जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथील सध्याच्या माने घराण्याचे संबंध राष्ट्रकूट राजांपर्यंत दिसून येतात. राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक मानाङ्क, तसेच येथील परिसरात माण, माणपूर, माणदेश, माण नदी अशी साधर्म्य असलेली नावे प्रचलित आहेत. शिवाय या भागातील माने लोक ‘माण नदीच्या काठावर राहणारे मानीं (अभिमानी) लोक म्हणून ‘माने’ हे आडनाव,’ असे माने आडनाव निर्मितीचे कारण अभिमानाने सांगताना दिसतात. राष्ट्रकुटांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे त्यांनी हातात आणि पायाखाली प्रत्येकी दोन नाग दाबलेला आक्रमक गरूड कोरलेला दिसतो. शिवाय माने कुळाचे देवकदेखील गरूड अर्थात गरूडपंख किंवा गरूडवेल असे आहे. माने कुळातील बहुसंख्य लोक आजही गरूड असे आडनाव धारण करून वावरताना दिसतात. यावरून मराठ्यांच्या ९६ कुळांतील माने/गरूड हे कूळ राष्ट्रकूट राजवंशाचे वंशज कूळ असावे असे समजले जाते. येथील रतोजीराव माने हे विजापूर दरबारातील मातब्बर सरदारहोते. त्यांचे पुत्र नागोजीराव माने हेसुद्धा तितकेच पराक्रमी शूरवीर होते. छत्रपती राजारामराजेंना जिंजीच्या वेढ्यातून सुटण्यास नागोजीराव यांनी मदत केली होती. नागोजीराव माने यांचा दहिगाव येथील भाळवणी या संस्थानचे नाईक-निंबाळकर यांच्या कन्या राधाबाई यांच्याबरोबर विवाह झाला होता.
सिध्दनाथ, म्हसवड
म्हसवड हे सिद्धनाथ मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील अनेक लोकांची कुलदेवता आहे. येथील रथोत्सव खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही लोक या उत्सवाला हजेरी लावतात. म्हसवड भागात १३व्या शतकात शिराळशेट नावाची धनाढ्य व्यक्ती होऊन गेली. त्यांनी दुष्काळात बैलगाडीतून गावोगाव जाऊन धान्य वाटप केले होते. बिदरच्या सुलतानाला हे कळल्यावर त्याने त्यांना बोलावून घेतले. ‘तुला पाहिजे ते माग’ असे सांगितल्यावर त्याने स्वतःसाठी काही न मागता देवस्थानच्या जमिनी, स्थावर मालमत्ता बादशहाने खालसा केल्या होत्या, त्या परत द्याव्यात, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. बादशहाने लगेचच फर्मान जारी केले व अशा जमिनी परत दिल्या. तेव्हापासून शिराळशेटची श्रावण शुद्ध षष्ठीस (श्रीयाळ षष्ठी) पूजा करण्याची प्रथा दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात सुरू झाली.
पिंगळी तलाव :
दहिवडी गावात जाण्याअगोदर पिंगळी तलाव दिसून येतो. हा ब्रिटिशकालीन तलाव गाळाने भरला आहे. जवळच मेष पैदास केंद्र आहे. दहीवडी गाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.
जांभुळणी :
म्हसवडजवळच जांभुळणी येथे भोजलिंग देवस्थान आहे. हे ठिकाण निसर्गरम्य डोंगरावर आहे.
राजेवाडी तलाव :
राजेवाडी तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारने १८७३ साली केली. तलावाचे धरण आटपाडी व माण तालुक्याच्या सीमेवर आहे व जलाशय माण तालुक्यात आहे. या तलावात राष्ट्रकुटांची राजधानी ‘मानपूर नगरी’चे अस्तित्व संपले. तथापि त्या ठिकाणी जवळच शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून, त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे.माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका. त्यात राजवडी ,बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. मात्र जर पावसाची कृपा झाली तर येथील तलावाला धबधब्याचे स्वरूप येते आणि परिसरातील लोक या माणदेशच्या भुशी डॅमचा आनंद घेतात.
शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे.
महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर असलेले शिंगणापूर दहिवडीपासून २० किलोमीटरवर आहे. वाईजवळील जांभळी खोऱ्यापासून निघालेली डोंगराची एक शाखा म्हणजे महादेवाचा डोंगर. याच शाखेमध्ये रायरेश्वर, केंजळगड, मांढरदेव, पांडवगड, वारुगड व सगळ्यात शेवटी येते शिखर शिंगणापूर. शिंगणापूरहून फलटण, माळशिरस, म्हसवड, दहिवडी येथे सतत वाहतूक चालू असते. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्री पाडव्यापासून चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून अनेक कावडींतून पाणी आणले जाते. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे खूप जिकिरीचे असते. मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी मारतात. ‘हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ’ अशी हाक मारतच कावड नेली जाते आणि महादेवाला अभिषेक करण्यात येतो. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळा असतो.
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून ३४५० फूट उंचीवर आहे. संपूर्ण मंदिराला तटबंदी आहे. हेमाडपंती शैलीतील मंदिर खूप सुंदर तर आहेच; पण वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुनाही आहे. मंदिराच्या परिसरातील दीपमाळा लांबूनच लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिव-पार्वतीचे प्रतीक मानतात. मंदिराची स्थापना यादवराज सिंधणदेव याने केली. गावही त्यानेच वसविले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शिंगणापूर येथे देणगी देऊन विहीर बांधल्याचे सांगितले जाते.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते.
पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत.या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत.या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.
काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.
मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.
जाण्यासाठी :-
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे.
पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात.
२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.
३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.
४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.
कारखेल :
शिंगणापूरहून म्हसवडला जाताना कारखेल गाव लागते. छत्रपती राजाराम महाराजांचे गनिमी काव्याने लढणारे सेनापती संताजी घोरपडे यांची येथे बेसावध असताना हत्या झाली. त्यांची समाधी सांगलीजवळील कुरुंदवाड येथे आहे. म्हसवड शहराला पाणीपुरवठा करणारी साठवण टाकीही येथे आहे.
समाधी जवळील भिंतीवरील संताजीच्या ओळख सांगणाऱ्या खालिल ओळी ओबडधोबड अक्षरात कोणीतरी लिहिलेल्या आढळल्या..या ओळी येथील शाळेतील कोणी लिहिल्या आहेत की कोणा प्रसिद्ध कवीच्या ते माहीत नाही.
" वाजी जरी घोड्याच्या टापा
की उठली धुरळ्याची छाया
छावणीत गोंधळ उडतो
संताजी आया आया.. "
साभार राजेन्द्र गलंड़े
येराळवाडी तलाव व सुर्याचीवाडी तलावः-
येरळवाडी व सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील मध्यम प्रकल्पांवर थंडीच्या काळात स्थलांतरित पक्षी मुक्कामास येतात. सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले तलावाकडे वळू लागतात.
सन १९७८ मध्ये पूर्ण झालेल्या येरळवाडी मध्यम प्रकल्पात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे अनेक स्थलांतरित पक्षी येथे दाखल होतात. चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल असे अनेक पक्षी येथे पहाण्यास मिळतात.याशिवाय या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) हा देखील हजेरी लावतो. मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात पक्षाचे वास्तव्य असायचे पण सध्या पक्षी तेथे न येता येरळवाडी तलावात येऊ लागले आहेत. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सैबेरिया, चीन, अफगाणिस्तान, रशिया आदी देशातून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. महाराष्ट्रात त्यांचा येण्याचा कालावधी हा डिसेंबरचा पहिला आठवडा असतो. तलावात पाणीसाठा असल्याने या पक्षांना खाद्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. तलाव परिसरात दलदलीच्या भागात फ्लेमिंगो पक्षी मासे कीटक, आटोलिया या सारख्या वनस्पतींच्या शोधत मुक्तविहार करताना दिसतात. त्यांच्या आकर्षक छबीचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी तलावाकडे धाव घेतात.सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाच्या आकर्षणात एक नवीन भर पडली आहे.
औंधः-
स्वातंत्र्यपूर्व काळातील औंध हे महाराष्ट्रातील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना किन्हईचे परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी सन १६९९ या वर्षी केली. परशुराम त्रिंबक यांना छत्रपती राजाराम यांनी १६९०मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. गावामध्ये पंतप्रतिनिधींचा मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा आहे. शेजारी श्री अंबामातेचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या सभागृहातच राजेसाहेबांचे कलाप्रेम दिसून येते. पौराणिक प्रसंगांची मोठी आकर्षक चित्रे येथे पाहायला मिळतात. तसेच दुर्मीळ अशा हंड्या व झुंबरेही पाहण्यास मिळतात. मूळ दोन मजली राजवाडा फारशा चांगल्या अवस्थेत नसला, तरी त्याची भव्यता लक्षात येते. बऱ्याचदा पर्यटक म्युझियम पाहून गावात न येता परस्पर निघून जातात. औंधला आल्यावर हे मंदिर आवर्जून पाहावे.
यमाई देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी असलेले राजे पंतप्रतिनिधी यांच्या कलाप्रेमातून निर्माण झालेले हे संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटक सतत येत असतात. तसेच शिवानंदस्मृती संगीत सोहळ्यात भाग घेण्यासाठी दिग्गज गायकांची उपस्थितीही येथे असते.
यमाई मंदिर महाद्वार औंध म्युझियम - दमयंती
औंध म्युझियम - ओलेती यमाई मंदिर
यमाई देवीचे मंदिर :
यमाई देवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फुटांवर असून, सातव्या शतकात बांधले असावे असे मानले जाते. पंतप्रतिनिधी घराण्यातील लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून सोन्याचा कळसही बसविला आहे. एखादा गड किंवा किल्ल्याप्रमाणे तटबंदी असणाऱ्या या मंदिराचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. तटावरून भोवतालच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराकडे येण्यासाठी खालपासून पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. छोटी गाडी मंदिरापर्यंत जाते; पण यात्रा काळामध्ये मात्र गाडी वर नेता येत नाही. या मंदिराबाबत असे सांगितले जाते, की पौराणिक काळात अंबऋषी मोरणतीर्थ परिसरात तप आणि यज्ञ करीत असत. मायावी विद्या येणाऱ्या औंधासुर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्ने आणायला सुरुवात केली. तेव्हा यमाई मातेने त्याच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले; मात्र औंधासुराने मरताना देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली. त्या वेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून त्या नगरीला ‘औंधा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. औंधासुराच्या कापलेल्या मस्तकाचे छोटे देऊळ मंदिर परिसरात बांधण्यात आले आहे. औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई माता स्नानासाठी केस मोकळे सोडून येथील तळ्यात उतरली. तेव्हापासून तिला ‘मोकळाई’ असेही म्हणतात. आजही या दगडी बांधणीच्या प्रशस्त मोकळाई तलावात पाय धुवून मग देवीदर्शनाला जाण्याची प्रथा आहे. या तळ्याची श्रमदानाने साफसफाई करण्यात येते. यमाईचे दर्शन झाल्यावर पायथ्याशी असलेल्या सुंदर बागेत आराम करून म्युझियम पाहावे.
भवानी संग्रहालय :
हे वस्तुसंग्रहालय १९३८ साली बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी निर्माण केले. आता ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. यामध्ये आठ हजारांपेक्षा जास्त वस्तू असून, प्रामुख्याने चित्रकला, शिल्पकला यांसाठी ते प्रसिद्ध आहे. स्वतः पंतप्रतिनिधी यांनी काढलेली व नामवंत चित्रकारांची पेंटिंग्ज, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या, लाकडाच्या वस्तू, हस्तिदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरूममधील दुर्मीळ मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दर्शन या ठिकाणी घडते. राजा रविवर्मा, चित्रमहर्षी बाबूराव पेंटर, सांगलीचे पंत जांभळीकर, गणपतराव वडणगेकर, आबालाल रहिमान, विनायक मसोजी, चंद्रकांत मांढरे, रवींद्र मेस्त्री, दिलीप डहाणूकर, रावबहादूर धुरंधर, एस. एच. रझा, पेस्तनजी बमनजी, एम. आर. आचरेकर, एस. एल. हळदणकर, प्र. अ. धोंड यांसारख्या अनेक ज्ञात-अज्ञात प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केली आहेत.
देशविदेशात औंध ओळखलं जातं ते तिथल्या नितांतसुंदर संग्रहालयामुळे. त्याचं नाव आहे श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय. इथले संग्रहालय, देशातील इतर संग्रहालयांपेक्षा थोडेसे वेगळे म्हणावे असे आहे. इथे संग्रहित आहेत आपल्या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील अस्सल परंतु दुर्मीळ चित्रकृती, शिल्पकृती आणि काही प्रसिद्ध चित्रे, शिल्पकृतींच्या प्रतिकृती. या कलाकृती साकारल्यात प्रत्यक्ष त्या त्या काळातील जगप्रसिद्ध कलाकारांनी. या कलाकृतींना इथे महाराष्ट्रात, औंधला कष्टपूर्वक, कलात्मकतेने, तितक्याच सौंदर्यदृष्टीने जमवलंय एका मराठी संस्थानिक राजाने. त्याचं नाव श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजे, औंध संस्थान. हा राजा होता कलारसिक, कला-इतिहास अभ्यासक, कलासंग्राहक, छायाचित्रकार, कलाकारांचा आश्रयदाता आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत: एक सिद्धहस्त चित्रकार.
औंधला पोहोचायला प्रथम साताऱ्याला जावे लागते. सातारा शहर मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा मोठय़ा शहरांशी महामार्गाने आणि लोहमार्गाने जोडलेले आहे. औंधला जवळ असणारे दुसरे छोटे शहर म्हणजे रहिमतपूर. हे शहरदेखील रेल्वेने जोडलेले आहे. ऐतिहासिक शहर रहिमतपूर आणि तिथली १७व्या शतकातील रणदुल्लाखानची कबर आणि इस्लामी वास्तू पाहून पुढे औंधला जाता येते. औंधला जाणारा रस्ता बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे हिरव्या, पिवळ्या, नानाविध छटांनी दुतर्फा बहरलेला असतो. नागमोडी वळणं घेत जाणारा हा रस्ता एका छोटय़ा घाटमाथ्यावर येऊन पुढे औंध शहराकडे वळतो. औंध शहरात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे दूरवर एक उंच पहाड आणि त्यावर तटबुरुजाच्या कोंदणात एका मंदिराचा कळस दिसू लागतो. हे मंदिर आहे श्री यमाई देवीचे; श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांची ही कुलदेवता. मुख्य रस्त्याला फाटा देत एक रस्ता डोंगरमाथ्याच्या दिशेने मंदिराकडे चढताना दिसतो. वळण घेत डोंगराच्या मधल्या टप्प्यावर हा रस्ता पोहोचतो तो औंधच्या श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाच्या आवारात. इथे उभी आहे १९३८ साली बांधून पूर्ण झालेली, निळेसावळे डोंगर व आकाशाच्या सान्निध्यातील संग्रहालयाची पांढरी करडी इमारत; वृक्ष, वेली, बगिचांनी वेढली आहे. या इमारतीची रचना खास संग्रहालयासाठीच केलेली आहे. या संग्रहालय वास्तूचे वैशिष्टय़ म्हणजे इमारतीच्या आत सूर्यप्रकाशाची केलेली कल्पक योजना. इथे मांडलेल्या प्रत्येक कलावस्तूवर दिवसभर पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश सौम्यपणे पसरलेला असतो. या इमारतीच्या छतभिंतींची खास रचना इथल्या शिल्पचित्रांना नैसर्गिक प्रकाशात उजळवून टाकते. प्रकाशाचे असे नियोजन चित्रातील रंग, रेषा, पोत आणि शिल्पांवर घडणाऱ्या छाया-प्रकाशाच्या खेळाला अप्रतिम लावण्य बहाल करते. आज श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक वेगळे आणि खास असे संग्रहालय ठरले आहे. या संग्रहालयाच्या आवारात प्रवेश करताच दिसते ते श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे तिथल्या आसमंतात असणारे मेघडंबरीतील स्मारकरूपी अस्तित्व. त्यानंतर आहेत इतिहासाचे पाषाणरूपी साक्षीदार; अप्रतिम जैन, वैष्णव, गजलक्ष्मी इत्यादी मूर्तीचे अवशेष, प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या शिळा- ज्याला ‘वीरगळ’ म्हणतात ते, पतिनिधनानंतर सती गेलेल्या वीरांगनांच्या ‘सतीशिळा’, ‘शिलालेख’ आणि इतर अवशेष. मुख्य इमारतीच्या समोर आवारात उभे असलेले रूपवान संगमरवरी पुतळे आणि यातून पुढे दिसतो तो या संग्रहालयाचा कमानीचा वऱ्हांडा. त्यासमोर प्रवेशद्वार आणि त्यावर विराजमान असलेली रिद्धीसिद्धीसह श्रीगणेशाची प्रतिमा, सकळ कलांची देवता. श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा विस्तार एकूण अठरा प्रशस्त कला विभागांचा असून, त्याखाली आणि वर अशा दोन भागांत विभागल्या गेल्या आहेत. तळाचा मध्यवर्ती भाग पुन्हा दोन विभागांत विभागून, यात प्रामुख्याने पाषाण आणि धातू शिल्पांची मांडणी केलेली आहे. इथली सर्व शिल्पे नैसर्गिक प्रकाशात उजळलेली असतात. या शिल्पांच्या लयदार, आरसपानी शरीरावर होणाऱ्या छायाभेदामुळे शिल्पसौंदर्याची नेत्रसुखद अनुभूती येते. इथल्या संग्रहात आहेत काही दिग्गज कलाकारांनी साकारलेली अस्सल शिल्पं, तर काही जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी साकारलेल्या महान कलाकृतींच्या हुबेहूब प्रतिकृती, त्याही तितक्याच तोडीच्या कलाकारांनी घडवलेल्या. यातल्या काही प्रतिकृती तर थेट १५-१६व्या शतकातल्या अलौकिक ठरलेल्या ख्यातकीर्त कलाकारांच्या. या प्रतिकृतीच्या मांदियाळीत आहेत खुद्द मायकल अॅन्जलोच्या (१४७५-१५६४) ‘डेविड’ची प्रतिकृती, तर इटालियन शिल्पकार अन्तोनिओ कानोव्हाच्या (१७५७-१८२२) तीन सौंदर्यवतींच्या अप्रतिम समूह शिल्पाची प्रतिकृती ‘थ्री ग्रेसेस’ आणि ‘व्हीनस इटालिका’सारखी नितळ संगमरवरी सौंदर्यवती. पूर्णाकृती धातुप्रतिमेत प्रसिद्ध इटालियन शिल्पकार, जियोवानी दा बलोनिया (१५२९-१६०८) याची ‘फ्लाइंग मक्र्युरी’ नावाची जगन्मान्य शिल्पप्रतिकृती; इथल्या शिल्पसंग्रहाची शोभा वाढवत आहे. हा शिल्पकार आपली शिल्पे कांस्य आणि पाषाणासारख्या दोन वेगवेगळ्या माध्यमांत लीलया साकारत असे. या झाल्या काही पाश्चात्त्य कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतींच्या अप्रतिम प्रतिकृती. महाराष्ट्रातल्या काही महान शिल्पकारांच्या संगमरवरी, कांस्यधातूच्या अस्सल कलाकृतीदेखील इथे प्रदर्शित आहेत. त्यात कोल्हटकरांनी घडवलेली छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची दोन पूर्णाकृती देखणी कांस्यशिल्पे, एक युद्धसज्ज आवेशपूर्ण, तर दुसरे धावणाऱ्या घोडय़ावर बसलेले. याच कलाकाराचे डरकाळी फोडणाऱ्या, परंतु सावधपणे बसलेल्या आणि आपल्या शेपटीची हालचाल करणाऱ्या वाघाचे शिल्प नक्कीच लक्ष वेधून घेते. वर्षां, ग्रीष्म, वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षांतले सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना मानवी रूपात, ते ही स्त्री रूपात कल्पून, त्यांची नितांत सुंदर शिल्पं इथे पाहायला मिळतात. या शिल्पांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचं सहज जाणवणारं मराठीपण. जणू महाराष्ट्रातल्या आसमंतात दरवळणारे हे सहा ऋतू मराठमोळं लावण्य लेवून प्रत्यक्ष आपल्यासमोर भासमान झालेले आहेत. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला नक्कीच बोलकं करते. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘वसंत वाटे अतिगोड साचा.. शृंगार केला विविध फुलांचा.. वेणींत कानांत किर कटीला. गळ्यांत दुर्डीत उणे न त्याला..’ या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंतललनेचं मूर्तरूप एकमेकांस साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन; एका हातात फुलांची परडी; तर दुसऱ्या हातात सनाल कमलपुष्पे घेतलेली. शिवाय मनगटावर सुमनवलये, तर दंडावर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत; गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज आणि टपोऱ्या गुलाब पुष्पांची दाट गुंफलेला. गोंडय़ाचा, जाडसर पण नाजूक हार गळ्यात घालून सुहास्यवदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. याउलट ग्रीष्म ऋतू वा ‘ग्रीष्मकन्या’ उन्हाच्या झळांनी व्याकूळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’; आणि या ऋतुकन्येवर केलेली काव्य रचना, ‘घे विंझणां वातचि उन्ह आला..ये घाम वेणीभर मुक्त केला.. त्यागी तसे आभरणांसि बाला. हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला..’, मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतुकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतुराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत. श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी शिल्पकलेलाही राजाश्रय दिला, त्यांनी अनेक स्थानिक शिल्पकार हेरून त्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी औंधला स्टुडिओची उभारणी केली. इतकेच नाही तर उत्तम शिल्पकामासाठी लागणारा उत्कृष्ट दर्जाचा संगमरवरी दगड ते दूर परदेशातून म्हणजे इटलीतून खास औंधला त्यांच्या स्टुडिओत मागवत असत. राजेसाहेबांच्या अशा मार्गदर्शनाने औंधला खऱ्या अर्थाने प्रतिभावंत शिल्पकार तयार झाले. पांडोबा पाथरवट आणि त्याची दोन मुले, राजाराम आणि महादेव हे तीन शिल्पकार, औंधला श्रीमंत राजे भवानरावांच्याच आश्रयाने नावारूपाला आले. त्यांनी अनेक शिल्पं घडवली; त्यातली अनेक शिल्प या कलाकारांनी ‘इटालियन मार्बल’मध्ये जरी कोरली असली, तरी त्यातून साकार झाली, ती इथल्या मातीतली ‘मराठी कलाकृती’. या शिल्पकारांनी घडवलेल्या अनेक सुंदर कलाकृतींपैकी काही कलाकृती इथल्या संग्रहालयात आज पाहायला मिळतात; संग्रहालयाच्या मध्यवर्ती भागात एक अवाढव्य बुद्धिबळाचा पट आपले लक्ष नक्कीच वेधून घेतो. या पटावर दिसतात ते एकमेकांसमोर युद्धासाठी सज्ज असलेले विविध वेशभूषेतील सैन्य. या सैन्यात आहेत शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी, परस्परविरोधी राजे, वजीर, अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि उंट. युद्धभूमीवर लाल करडय़ा रंगातील हे सैन्य त्यांच्या त्यांच्या चौकोनात सज्जपणे उभे आहे. बुद्धिबळाचा हा पट खेळ सुरू झाला की सजीव होई. दोन्ही बाजूंकडून जो हा खेळ खेळला जात असे तेव्हा ही प्यादी उचलून ठेवायला माणसे असत. संग्रहालयाच्या आतील प्रशस्त प्रवेश मार्ग वेगवेगळ्या गॅलरीजना जोडला असून, या मार्गावर श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे आत्मचरित्र कृष्णधवल छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. या छायाचित्रांतून पुढे सरकणारा त्यांचा जीवनप्रवास दर्शकास घेऊन जातो तो थेट भारतीय लघुचित्रांच्या, जलरंग, तैलरंगांच्या चित्रमयजगतात. इथल्या गॅलरीजच्या भिंतींवर विराजमान आहेत, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे. जगद्विख्यात देशी- परदेशी चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती, तर काही चित्रकारांच्या एकमेव अस्सल चित्रकृती, अजिंठय़ाच्या चित्रांच्या आद्य प्रतिकृती, लाकडावर केलेले अप्रतिम कोरीव काम, हस्तिदंतातील प्रतिमा आणि त्यावरील नाजूक कलाकुसर, कांस्यमूर्ती, पुतळे, चिनीमातीची रंगीत नाजूक lp15भांडी, कापडावरील नक्षीकाम, गालिचे, शस्त्रास्त्रे, तिबेटी, चिनी, आफ्रिकन कलावस्तू, अशा नानाविध दुर्मीळ ऐतिहासिक कलावस्तू. प्राचीन भारतीय चित्रकलेतील लघुचित्रांचा अर्थात ‘मिनिएचर पेंटिंग्ज’चा वेगळा असा खजिना इथल्या संग्रहात पाहायला मिळतो. यात मुघल, पहाडी-कांग्रा, राजस्थानी, पंजाब आणि दख्खनी चित्रशैलीच्या विजापूर, मराठा चित्रशैलीतील चित्रांचा समावेश आहे. यात काही रागमालाचित्रे, देवी-देवतांची चित्रे तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर काव्य करणाऱ्या कविभूषणाचे चित्र, छत्रपती श्रीशाहूमहाराज, पेशवे आणि काही मराठेशाहीतील प्रमुख सरदार यांची दुर्मीळ व्यक्तिचित्रे आहेत. परंतु या चित्रसंग्रहात सर्वात महत्त्वाचा आणि अद्वितीय आहे तो ‘किरातार्जुनीय’ या महाकवी कवी भारविच्या संस्कृत महाकाव्यावर आधारित लघुचित्रांचा देखणा चित्रसंच. महाकवी भारवि हा सहाव्या शतकातील एक प्रतिभासंपन्न संस्कृत कवी. महाकवी भारविच्या ‘किरातार्जुनीय’चा जवळपास शंभर चित्रांचा रंगीत संच चितारला आहे तो थेट अठराव्या शतकातील पहाडी चित्रकारांनी. कवी भारविचे ‘किरातार्जुनी’ हे सहाव्या शतकातील महाकाव्य, अनेक प्राचीन कलाकारांनी या काव्याचे रूपांतर शिल्प, चित्रात यापूर्वी केलेले आहेच.. या काव्याची भुरळ अगदी आजही तेवढीच आहे. हे काव्य आधारित आहे अर्जुन आणि किराताचे रूप घेतलेल्या देवाधिदेव महादेव यांच्यामधील युद्धावर. हे युद्ध म्हणजे शिवाने अर्जुनाची घेतलेली परीक्षा होती. ही परीक्षा का? तर अर्जुनास महादेवकडून तेजस्वी ‘पाशुपतअस्त्र’ प्राप्त करायचे होते म्हणून. ‘किरातार्जुनीय’ची कथा लघुचित्ररूपाने आपल्या समोर क्रमवार सरकत जाते ती अनेक प्रसंगांच्या चित्रणातून. हे प्रसंग बारकाव्यासह चितारलेत. यात डोंगर, झाडे, पाने, फुले, पक्षी, मृत अथवा जीवित पशू, पाणी, आकाश, देव, दानव, यक्ष, अप्सरा, राजमंदिरे, युद्धभूमी, परस्परविरोधी शस्त्रास्त्रे; जशी पर्जन्यास्त्र विरुद्ध अग्निस्त्र, सर्पास्त्र विरुद्ध गरुडास्त्र. आणि शेवटी अर्जुनाने प्रत्यक्ष पशुपती शिवाला प्रसन्न करून पाशुपतअस्त्र कसे मिळवले याचे मनोहारी दर्शन देत ही चित्रकथा संपते. भारविच्या काव्य प्रतिभेचे हे रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून साकार झालेले ‘चित्रकिरातार्जुनीय’ असे दुसरे नाही. अजिंठा लेणीचा शोध आणि तिथली प्राचीन भित्तिचित्रे जगभराच्या कलाइतिहासाच्या विषयात एक आश्चर्याचा विषय ठरली गेली. या भित्तिचित्रांच्या प्रथम प्रतिकृती चितारल्या त्या इंग्रज चित्रकारांनी, परंतु चित्रकार आणि कला इतिहासकार असलेल्या श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी आणि त्यांच्या सहकारी चित्रकारांनी अजिंठय़ाच्या चित्रांच्या अनेक प्रतिकृती केल्या, त्याही रंगीत छायाचित्रणाच्या त्या वेळच्या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. आज अजिंठय़ाच्या या बहुमोल प्रतिकृती औंधच्या संग्रहालयाच्या कलादालनात पाहायला मिळतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती आणि काही चित्रकारांच्या दुर्मीळ, परंतु मूळ चित्रकृती हे या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्टय़. प्रसिद्ध ‘रेनिसान्स’ चित्रकार लिओनाडरे दा विन्ची (१४५२-१५१९) याची ‘मोनालिसा’ आणि ‘सेंट जॉन इन द वाइल्डरनेस’ या दोन चित्रांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे आहेत. इटालियन चित्रकार राफिएल (१४८३-१५२०) याचे गाजलेले चित्र ‘मॅडोना ऑफ द चेअर’; प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार इंया ओगीस डोमिनिक एंग्रा (१७८०-१८६७) याची ‘द सोर्स’सारखी चित्रप्रतिकृती. या आणि अशा अनेक चित्रकृती सुवर्णजडित नक्षीदार चौकटीच्या कोंदणात एखाद्या अमूल्य रत्नासारख्या जपलेल्या आपल्याला इथे दिसतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या अस्सल चित्रात, स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को गोयां (१७४६-१८२८) हा ओल्डमास्टर्समधला शेवटचा चित्रकार त्यांनी स्वत: चितारलेले ‘मार्केट सीन’ हे चित्र; तर दुसरा स्पॅनिश चित्रकार एफ. लिंगर हिदाल्गो (१८८०-१९४५) याचे ‘पॅलेस ऑफ अॅलेक्झांडर’ आणि फ्रेडा मारस्टोन (१८९५-१९४९) नावाच्या चित्रकर्तीचे ‘सीन ऑफ टॉवर’ यासारखे जगद्विख्यात चित्रकार आणि त्यांच्या ‘ओरिजिनल’ चित्रकृती औंधच्याच संग्रहात आहेत. या संग्रहात विसाव्या शतकातील प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर यांनी साकारलेले शिल्पदेखील आहे. भारतीय चित्रकलेचा युगप्रवर्तक चित्रकार राजा रवी वर्मा (१८४८-१९०६) आणि श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी दोघेही समकालीन. दोघेही एकमेकांचे प्रशंसक होते. राजा रवी वर्माने चितारलेली तीन विख्यात चित्रे, ‘सैरंध्री’, ‘मल्याळम स्त्री’ आणि ‘दमयंती’ या संग्रहालयाच्या कलादालनात जपलेली आहेत. याव्यतिरिक्त प्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर (१८६७-१९४४) यांची चित्रे. चित्रकार मुल्लर (१८७८-१९६०) यांनी चितारलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चित्ररूप चरित्र. अॅन्तोनिओ त्रिंदाद (१८६९-१९३५) ज्यांची ख्याती पूर्वेचा ‘रेम्ब्रॉ’ अशी होती. महाराष्ट्रातले दिग्गज चित्रकार आबालाल रहिमान, माधव सातवळेकर, हळदणकर, बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, जी. ठाकूरदास, एम.जी. गुजर, चित्रकर्ती अंबिका धुरंधर आणि बंगालच्या नंदलाल बोस, जे. पी. गांगुली, यामिनी रॉय, सरला वर्मा. सारदा उकील यांच्या प्रसिद्ध चित्रांनी इथले कलादालन सजले आहे. अर्थात एवढय़ावरच औंधचे संग्रहालय संपत नाही. श्रीमंत पंतप्रतिनिधीचे वडीलदेखील कलाप्रेमी होते. त्यांनी भिवा सुतार नावाच्या एका उत्तम चित्रकार, शिल्पकारास राजाश्रय दिला होता. या चित्रकाराने अनेक चित्रं काढली, पण त्याचे एक चित्र ‘रामपंचायतन’ खूपच प्रसिद्ध झाले, त्याच्या अनेक रंगीत शिळाछापप्रती निघाल्या, अनेकांच्या घरात त्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या ते चित्र या संग्रहात आजही विराजमान आहे. या चित्रकाराव्यतिरिक्त बरमप्पा कोटय़ांळकर नावाचा दुसरा प्रतिभावान चित्रकार पंतप्रतिनिधींकडे होता. हा चित्रकार निष्णांत व्यक्तिचित्रकार, निसर्गचित्रकार होता, पण त्याची खरी प्रतिभा दिसत होती, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांच्या चित्रणातून. ‘शिवाचे तांडव’, ‘राज्याभिषेक’, ‘कृष्ण’, ‘दत्त’ आणि ‘त्रिपुरासुरवध’ यांसारखी सुंदर चित्रं या चित्रकाराने साकारली. आज ही चित्रे त्या त्या चित्रकारांना समर्पित केलेल्या कला दालनातून मांडलेली आहेत. हस्तिदंतात कोरलेल्या वस्तूंचे एक वेगळे दालन इथे आहे. या दालनात आहेत शुभ्र हस्तिदंतात कोरलेल्या नाजूक देवप्रतिमा, व्यक्तिप्रतिमा आणि नक्षीदार वस्तू. काही मूर्तीवर तर शुद्ध सुवर्णाचा वर्खदेखील जडवला आहे. हस्तिदंती प्रतिमांचे इथले वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या काही प्रतिमांची दिसणारी स्थानिक मराठी शैली. श्री राम, सीता, हनुमान, श्रीविष्णू शारदागणेश. इत्यादी मूर्ती मराठी शैलीत फारच खुलून दिसतात. हस्तिदंतात कोरलेल्या बंगाली आणि इतर शैलीतील मूर्तीसुद्धा इथे आहेतच. अर्थात हस्तिदंती कलेचे इथले दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे छोटी व्यक्ती शिल्पे. ही शिल्पे आहेत श्रीमंत श्रीनिवास महाराज आणि स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि इतर व्यक्तींची. महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्तिशिल्प घडवलीत त्या त्या व्यक्तींच्या रंगचित्रांवरून. एकीकडे त्या व्यक्तीचे चित्र आणि दुसरीकडे ही छोटी शिल्प ठेवली की त्यातलं तंतोतंत साम्य लगेच लक्षात येतं. खरं तर हा एक दुर्मीळ कलाप्रकार इथेच पाहायला मिळतो. ही हस्तिदंती कला साकारली आहे महादेव पाथरवट आणि त्याच्या शिष्यांनी; औंधलाच हे कलाकर ही कला शिकले. गुडीगर नावाच्या कर्नाटकातील शिरसीच्या कलाकाराची चंदनाच्या लाकडातील दोन कलाकृती अप्रतिम काष्ठशिल्पाचा नमुना आहेत. एक श्रीदेवी यमाई आणि दुसरे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चंदनात साकार झालेले ‘शिवचरित्र’ अत्यंत नाजूकपणे कोरले आहे. याव्यतिरिक्त स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी चित्रित केलेली अनेक चित्रं इथल्या संग्रहालयाच्या एका दालनात मांडलेली आहेत. या चित्रात रामायणावर आधारित अनेक चित्रं आहेत. याशिवाय त्यांनीच चितारलेली, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगावर आधारित चित्रेदेखील आहेत. सुप्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर यांच्या मते प्रतिनिधींच्या चित्राची एक वेगळी शैली होती; त्यांच्या त्या खास शैलीस त्यांनी ‘औंधस्कूल’ नावाने गौरविले होते. औंधचे श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा फक्त एवढय़ाच संग्रहावर थांबले नाहीत तर आजही या संग्रहालयाचा चित्र, शिल्पसंग्रह समृद्ध होत आहे; त्यामुळे आधुनिक कलाकारांच्या अनेक गाजलेल्या कलाकृती आपल्याला इथे पाहावयास मिळतात. या संग्रहालयाच्या नावात ग्रंथालयाचा उल्लेख येतो कारण औंधच्या राजाने अनेक पुस्तकेही जमवली होती. त्यातूनच या ग्रंथालयाचा जन्म झाला. आज शेकडो दुर्मीळ पुस्तके अभ्यासकांसाठी इथे उपलब्ध आहेत. औंध संस्थानचे तत्कालीन राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी बांधलेले श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय वैशिष्टय़पूर्ण होते. इथली प्रत्येक अमूल्य कलावस्तू त्यांनी स्वत: देशविदेशात जाऊन जमवलेली. त्यांच्या या कलासंग्रहाचा आणि तद्नंतर संग्रहालय उभारण्याचा काही विशिष्ट हेतू होता; हा हेतू होता मराठी मनाच्या ज्ञानमय कलाजाणिवेचा, सौंदर्यदृष्टीचा आणि विशेष म्हणजे भविष्यातील कलाकारांच्या पिढीसाठी नवनिर्मितीच्या प्रेरणास्रोतांच्या आदर्श कलासंग्रहाचा. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रकला, शिल्पकला संग्रहालयाची अशी वेगळी, आदर्श कल्पना बहुधा महाराष्ट्रात, औंधलाच प्रथम साकार झाली असावी. आज श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीच्या मनातील संग्रहालयाची संकल्पाना सफल झाली आहे. हे संग्रहालय सर्वसामान्यांच्या कला जाणिवेचे, चित्रशिल्प कलेच्या अभ्यासकांचे प्रमुख केंद्र ठरले आहे. डॉ. श्रीकांत प्रधान
पंतप्रतिनिधी स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. संस्थानाच्या शेतात पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वत: सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत. त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले.
पुसेसावळी :
येथील अयाचित घराण्यातील पूर्वज पांडुरंग अयाचित यांना आळंदीकडून दोन अजानवृक्ष व ज्ञानेश्वरांची मूर्ती प्राप्त झाली. आज या ठिकाणी दोन-अडीचशे वृक्ष आहेत. या ठिकाणी असलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
जयराम स्वामींचे वडगाव :
स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व काही ऐतिहासिक दस्तऐवज सापडल्याने या गावाचे ऐतिहासिक महत्व वाढले आहे. रामदासी संप्रदायातील जयराम स्वामी वडगावकर यांचा मठ वडगाव येथे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नऊ सप्टेंबर १९४२ रोजी चले जाव आंदोलनात वडगावचे सुपुत्र परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लोकांनी खटाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चावर जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात खटाव तालुक्यातील बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण खटावकर, (पुसेसावळी) परशुराम घार्गे, आनंदा गायकवाड, सिधू पवार, किसन भोसले, खाशाबा शिंदे, रामचंद्र सुतार (वडगाव), श्रीरंग शिंदे (उंचिठाणे) या नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. वडगाव मठातील मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराजांना या मठाची सफाई करताना एक दफ्तर सापडले. त्यामध्ये ऐतिहासिक व्यक्तींची मोडी लिपीतील पत्रे मिळाली आहेत. या पत्रांमध्ये छत्रपती शाहू महाराज, सेनापती संताजी घोरपडे, माधवराव पेशवे यांच्या पत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे स्वामींनी इतिहास अभ्यासक घन:श्याम ढाणे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. त्यावर आता अभ्यास चालू असून काही ऐतिहासिक संदर्भ इतिहासकारांना उपलब्ध होतील. खटाव :
देशाचे पंतप्रधान घडविणाऱ्या गुरूंचे हे जन्मठिकाण, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे हे गाव. त्यांचा जन्म खटाव येथे झाला. हे तालुक्याचे नाव असलेले ठिकाण आहे; मात्र प्रशासकीय सोयीसाठी तहसीलदार कार्यालय व अन्य शासकीय कार्यालये वडूज येथे आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. शिवाजी महाराज, विजापूरचा लुत्फुल्लाखान, कृष्णराव खटावकर यांचे या भागावर आधिपत्य होते.
कटगुण :
थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे हे मूळ गाव. त्यांचे मूळचे आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे वाडवडील पुण्यात स्थायिक झाले होते व ते फुलांचा व्यवसाय करीत. त्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले. त्यांच्या पत्नीचे माहेर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील. हे गाव शिरवळच्या पश्चिमेला असून, त्यांचे तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. कटगुणचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील एक विद्वान चार पीठांपैकी एका पीठाच्या शंकराचार्य पदावर जाऊन पोहोचले होते. गावकऱ्यांना या दोन्ही गोष्टींचा अभिमान आहे. जवळ असलेल्या खातगुण गावात पीर राजेसाहेब बागर यांचा दर्गा असून, तेथे दर वर्षी मोठा उरूस भरतो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खातगुण उरसाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात.
भूषणगड भूषणगड :
सिंधणदेव यादवानेच भूषणगडाची निर्मिती साधरण इ. स. १२१० ते १२४८ यादरम्यान केली. त्यानंतर हा किल्ला बहामनी राज्यात गेला. त्यानंतर विजापूर आदिलशाही, मराठे, संभाजी महाराज, औरंजेब यांच्यानंतर हा किल्ला पुन्हा शाहू महाराजांच्या ताब्यात आला आणि अखेरीस ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला २९५० फूट उंचीवर आहे. वडूजच्या दक्षिणेस पुसेसावळी मार्गावर हा किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या भूषणगड गावापर्यंत गाडीरस्ता आहे. तेथून ३० ते ३५ मिनिटांत गड चढून जाता येतो. या किल्ल्यावरून बऱ्याच लांबचा पल्ला दिसतो. हा किल्ला टेहळणीसाठी महत्त्वाचा असावा. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. भक्तांच्या अर्थसाह्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे. दोन बुरुजांमध्ये दरवाजा आहे. त्याची कमान पडली आहे. तटबंदी बऱ्यापैकी दिसून येते.
कातरखटाव -
खटाव तालुक्यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले.
कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत. गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :- मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.
सोमेश्वर मंदीर गुरसाळे -
वडूज-कराड मार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी. त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे. महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच.. माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेश महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते. जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली. बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल? पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात 20 रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात करूया. खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते. जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्ण गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.
गुरसाळे मंदिर
सोमेश्वर मंदीर गुरसाळे - भावलिंग - गुरसाळे
सरसेनापती धनाजीराव जाधव वाडा- मांडवे*
सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेल्या मांडवे गावात सरसेनापती धनाजीराव जाधव ह्यांचा वाडा आहे. वाडा तसा साधारण परिस्थितीत उभा आहे. वाड्यात जाधवराव घराण्याची वंशावळ आहे. गावात धनाजींचे पुत्र संताजी जाधव ह्यांची समाधी आहे. समाधीभोवती झाडाने विळखा घातला आहे. धनाजीराव हे राजे लखुजीराव जाधव यांचे द्वितिय पुञ राजेअचलोजी यांचे पणतु होते. त्यांचा जन्म इ.स. १६४९ मध्ये झाला. त्यांचा मृत्यू २७ जून १७१० रोजी झाला.
इ स १६७२ मध्ये प्रतापराव गुजर यांचा पराभव झाल्यावर तेव्हा धनाजीराव यांनी पराभुत सैन्यास धिर देऊन धनाजीराव ,संताजी घोरपडे व हंसाजी मोहिते यांनी बहलोलखानावर हल्ला चढवुन त्याचा पराभव केला.
तेव्हा धनाजीराव यांना सरदारकी दिली व हंसाजी मोहिते यांना "हंबीरराव" किताब शिवरायांनी दिला.
इ स १६७४ मध्ये मोगल व आदिलशहा यांनी एकञ येऊन स्वराज्य बुडवण्याचा कट केला.तेव्हा शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक सरदारांना सैन्यासह पाठवून पराभव केला.यात धनाजीराव यांनी पराक्रम केला.
धनाजीराव यांनी बंडखोर बेरड नाईक समाजाला स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले होते.
औरंगजेबाने मरतेवेळी धनाजीराव व मराठे यांच्या विषयी उद्गार काढले," आपण स्वतः दक्षिणेत येऊन २५ वर्षे युद्ध चालविले ही आपली फार मोठी चुक जाहली.धनसिँग जाधवराव ये कुछ इन्सान नही है,सैतान है.हमारे सायप्याज खाके आजतक लडता है और हमारी पातशाही यह छीन लेगा ऐसा हमे मालुम पडा है." असे बोलुन प्राण सोडला. धनाजीराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व शाहु महाराज या प्रत्येक छञपतींच्या अधिकाराखाली अतुलनीय पराक्रम केला होता.
सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे…
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात शूर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भव्य वाडा आहे. भोसरे गाव कोरेगाव रहिमतपूर पासून जवळ आहे. साताऱ्यापासून साधारण ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात असलेला वाडा सद्यस्थितीत खूप चांगल्या अवस्थेत नाही. वाड्यामध्ये छोट्या घरात प्रतापराव गुजर यांचे वंशज राहतात. तेथेच प्रतापरावांचा अर्धपुतळा व स्मारक आहे. जवळच प्रताप सृष्टीचे काम सुरू आहे. गुजरांची अजून एक शाखा नागपूरला आहे.
प्रतापराव यांचा जन्म घरंदाज पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव “कुडतोजी” असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यांची आवड होती. धिप्पाड शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, हुशारी या गुणांमुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले. जेव्हा महाराज आग्रा मध्ये अडकले होते त्यावेळी प्रतापरावांनी सरदार अष्टप्रधान या सर्वांच्या बैठका घेऊन स्वराज्य सावरले होते व संपत्ती गोळा केली होती या सर्वांमुळे कुडतोजी यांना महाराजांनी “प्रतापराव” ही पदवी दिली.
इ.स. २४ एप्रिल १६६० रोजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळालेल्या मराठा सरदार संभाजी कावजी यांना प्रतापरावांनी ठार मारले. इ.स. १६६३ मध्ये सिंहगड व मावळ प्रांतात हैदोस घालणाऱ्या मोगली सैन्याचा बंदोबस्त केला. सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखानाची नाचक्की केली व तो पुण्यात येऊन बसला. इ.स. ३० सप्टे १६६४ रोजी मिर्झाराजे जयसिंग याच्या खुनाचा प्रयत्न प्रतापरावांनी केला पण तो असफल ठरला. इ.स. १७ ऑक्टोबर १६७० रोजी नाशिक दिंडोरी जवळ मोगली सैन्याचा पराभव केला. क्रूर मोगल सरदार दाऊद खान व इकलासखान यांना ठार मारले.
बहलोलखान जेव्हा पन्हाळगडावर चालून आला तेव्हा महाराजांनी विजापूर वर स्वारी करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. तेव्हा खवासखान हा घाबरून गेला व त्याने बहलोलखानाला पुन्हा विजापूरला बोलावून घेतले. तो विजापूरला परतत असताना प्रतापरावांनी उमराणी जवळ त्याच्या सैन्यावर हल्ला चढविला व त्याला जेरीस आणले. अखेरीस त्याने जिवाची पर्वा करत हिरे, सोने, संपत्ती सर्व प्रतापरावांना घेऊन आपली सुटका केली. शत्रूला असेच सोडून दिले म्हणून महाराज प्रतापरावांवर रागवले तेव्हा त्यांनी शपथ घेतली की बहलोलखानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही. आणि तो असामान्य शौर्याचा दिवस उजाडला इ.स. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव आपले सहकारी विठोजी शिंदे, विठ्ठल अत्रे, दिवाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ यांच्यासह गडहिंग्लजजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानावर तुटून पडले. पण बहलोलखानाच्या सैन्यापुढे या सर्वांना वीरमरण प्राप्त झाले. पुढे कवी कुसुमाग्रज यांनी “वेडात मराठी वीर दौडले सात” ही अजरामर काव्यरचना केली.
प्रतापरावांची दोन मुले जगजीवन व खंडोजी हे शंभुराजे सोबत होते. जेव्हा क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंना धर्मांतर करायला लावले तेव्हा आपल्या राजाचं धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून या दोघांनी आपले धर्मांतर केले. खंडोजी बनले अब्दुल रहीम व जगजीवन बनले अब्दुल रहमान. अशा या पराक्रमी गुजर कुटुंबीयांना शत शत नमन.
कलेढोण :
या गावाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री व एक कुलगुरू दिला. माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले व त्यांचे बंधू विद्यावाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे हे जन्मठिकाण आहे.
मायणी गाेलघुमट - मायणी पक्षी अभयारण्य मायणी इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य :
दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी तलाव बांधला. वन खात्यामार्फत या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे पक्षी अभयारण्यात रूपांतर करण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत. या ठिकाणी पक्ष्यांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवाऱ्यासाठी झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीही येथे हिवाळ्यात येतात. सायबेरियातील फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर येतात. गरुड, ससाणा, विविध जातीची बदके, पाण्यावरून पळत जाणारे नाम्यापक्षी, सारस (करकोचे), पाण्यात बुड्या मारणारे पाणबुडे इत्यादी पक्षी हंगामानुसार पाहायला मिळतात. चांद नदीच्या काठावर वसलेले मायणी हे गाव या भागातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. या गावामध्ये यशवंतबाबा व सिद्धनाथाची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३व्या शतकात यादवकालीन राजा सिंधण याने बांधलेले महादेवाचे हेमाडपंती प्राचीन मंदिर आहे. तसेच येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे.
सिद्धेश्वर मंदीर - कुरोली कुरोली सिद्धेश्वर :
खटाव, येरळा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पिंडीवर अभिषेकाची धार धरल्यावर शिट्टीसारखा शिवनाद निघतो. त्याला सिंहनाद म्हणतात. भारतातील शिवस्थानांपैकी शिवनाद करणारे हे एकमेव स्थान आहे. सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे हे जन्मगाव.
सापचा एतिहासिक वाडा
गावाचं नाव साप कसं पडलं? तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात.
थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेला. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत हे इंद्रोजीहि होते (जानेवारी १७५०). तर या कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. काहींच्या मते इंद्रोजी आणि खंडोजी (की कंठोजी) कदम यांनी त्याकाळी बांधलेला हा वाडा आहे. बांधणीनुसार तो पुढे-मागे नंतरच्या काळात अजून वाढवलेला असावा असं वाटतं.
सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.
पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती).
इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.
मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच आपण खुश होऊन जातो. वाडा बर्यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह प्रशस्त ओसरी असलेला आहे. इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्यांच्या कोपर्यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत.
इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो.
ही दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना खरंच खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा भरायची. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि निगा राखलेली दिसतेय. हे एक छानच.
पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं.
इथे या फोटोमध्ये कोपर्यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा.
परत दुसर्या बाजूने ओसरीवर यावे. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता.
आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा रिनोवेट केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.
खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले.
पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
अंभेरीचे कार्तिकेय मंदिर
कार्तिकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि कार्तिकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, कार्तिकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर कार्तिकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त कार्तिकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते.
परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कार्तिकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा कार्तिकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. कार्तिकेय या देवतेचा उल्लेख अथवा आढळ हा अगदी कुषाण काळापासून म्हणजेच इ.स.च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून सापडतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर स्कंद, कुमार, विशाख असे वेगवेगळे देव आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर येणाऱ्या यौधेयांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेवाचे अर्थात कार्तिकस्वामीचे दर्शन घडते. कार्तिकेय आणि अग्नी यांचा संबंध पाहून काहींनी थेट ऋग्वेदाशी त्याचा दुवा जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उत्तर वैदिक काळात त्याचे स्कंद हे नाव पुढे आले आणि त्यानंतर सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र अशी एक नाम शृंखलाच पाहायला मिळते. स्कंद हा धूर्त आणि चोर लोकांचाही देव समजला जातो. त्याचा एक संदर्भ मृच्छकटिक या नाटकात सापडतो. चारुदत्ताच्या घरी चोरी करणारा शर्वलिक हा प्रत्येक वेळी कार्तिकेयाचे स्मरण करून कामाला सुरुवात करतो असे उल्लेख आहेत.
कार्तिकेयाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्याच्या जन्मासंबंधीसुद्धा अनेक कथा निगडित आहेत. तो शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे असे मानले असले तरी तो पार्वतीचा अंगज पुत्र नसून, विभावसू अग्नीचा पुत्र होता. कार्तिकेय हा उमा, गंगा व कृत्तिकेचा पुत्रदेखील मानला गेला आहे. जन्मानंतर त्याच्यावर संस्कार करण्यास कोणी येईना म्हणून विश्वामित्राने त्यावर योग्य ते संस्कार केले होते अशा असंख्य कथा आहेत. एक गोष्ट मात्र खरी की कार्तिकेय ही शक्तीची देवता आहे. कदाचित काही टोळ्यांचे नेतृत्व त्याकडे होते. स्थानिक लोकदेवतांमधून या देवतेचा उगम झालेला दिसतो. भारतभर सर्वत्र सेनापती म्हणूनच ही देवता लोकप्रिय आहे. विविध राजसत्तांच्या नाण्यांवर असलेले कार्तिकेयाचे अंकन तसेच गांधार कलेतील त्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमा हे त्या देवतेच्या लोकप्रियतेचेच गमक होय. कोंबडा हे चिन्ह काíतकेयाच्या बरोबर कायमच दिसते. उत्तर भारतात लोकप्रिय असलेला कार्तिकेय नंतर नंतर दक्षिण भारताकडे गेलेला दिसतो. आणि तिथे तो षण्मुगम, सुब्रह्मण्यम, आणि मुरुग्गन या नावांनी प्रचंड प्रसिद्ध पावला आहे. खरं तर आता उत्तरेकडे कार्तिकेयाची पूजा जवळपास बंद झालेली असताना दक्षिणेत मात्र त्याची लोकप्रियता अबाधित आहे. गावोगावी कार्तिकेयाची मंदिरे आहेत आणि उपासकही आहेत. इथले खास वैशिष्टय़ म्हणजे दक्षिणेत त्याला दोन पत्नी दिसतात. देवसेना आणि महावल्ली ही त्यांची नावे. खरं तर देवसेना ही त्याची पत्नी नसून त्याची शक्ती आहे. तारकासुर वधाच्या वेळी तो देवांच्या सेनेचा प्रमुख झाला होता, त्यामुळे देवसेना ही त्याची शक्ती होते तर महावल्ली ही त्याची पत्नी होय.
या संपूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडील कार्तिकेयाच्या प्रवासात महाराष्ट्रात मात्र त्याचे अस्तित्व अगदी नगण्य जाणवते. वेरुळच्या लेणींमध्ये कार्तिकेयाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, पण इथे तो शिवपरिवारातील देवता म्हणून दिसतो. तसेच औंढय़ा नागनाथ मंदिरावर पण सुबक अशी कार्तिकेयाची प्रतिमा दिसते. पण उपास्यदेवता म्हणून वेगळे मंदिर अगदी अपवादानेच आढळते. (पुण्याला पर्वतीवरील मंदिर). कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे कार्तिकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी कार्तिकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. अंदाजे अशासाठी की वर्षांनुवष्रे तेल वाहिल्यामुळे त्या हातांवर एकप्रकारचे किटण तयार झालेले दिसते. आणि त्या थरात ते हात झाकून गेले आहेत. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात कमरेवर ठेवलेला स्पष्ट दिसतो. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. दोन्ही हातांच्या खाली त्रिकोणी बोकडाच्या चेहेऱ्यासारखे अंकन आढळते. मूíततज्ज्ञ डॉ. देगलूरकर सरांच्या मते ते छगवक्त्र आणि नगमेष आहेत. कार्तिकेयाचा अग्नीशी असलेला संबंध इथे नगमेषाच्या रूपात दाखवला आहे. अग्नीनेच आपल्या मुलाला म्हणजेच कार्तिकेयाला खेळवण्यासाठी मेषाचे रूप घेतले होते अशी कथा पुराणात येते, त्याचाच हा पुरावा म्हणा किंवा त्यानुसार केलेले हे अंकन इथे दिसते. या सर्व बारकाव्यांवरून ही मूर्ती अंदाजे बारा-तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या कार्तिकेय प्रतिमेच्या गळ्यात एक घट्टसर दागिना व त्याखाली त्रिकोणी असणारा ग्रैवेयक हा दागिना दिसतो. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक कार्तिकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची कार्तिकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात. इतक्या निर्मनुष्य ठिकाणाचे हे नितांतसुंदर देवस्थान मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण आहे. कार्तिकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळत नसली तरी शक्तीचे प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत प्रचंड लोकप्रिय आहे. तारकासुराच्या वधासाठी देवांनी कुमार वयातच कार्तिकेयाला सेनापतीपद बहाल केलं आणि त्याने मग दैत्याचे निर्दालन केलं, असं सांगितलं जातं. सर्व सेनानीमध्ये तो अग्रणी आहे. गीतेमध्ये विभूती योगात भगवान म्हणतात की, पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर: म्हणजेच पुरोहितांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये स्कंद तर जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. शक्ती, सेना, सामथ्र्य या सर्वाचं प्रतीक असलेला हा स्कंद, कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या कार्तिकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे. आशुतोष बापट
कसे जाल खटाव भागात?
फलटण-आटपाडी रस्ता, चिपळूण-कराड-पंढरपूर रस्ता, तसेच सातारा-पंढरपूर रस्ता या मार्गांनी खटाव भागात जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन कोरेगाव. मार्च ते मेअखेर उन्हाळा जास्त असतो. राहण्याची, जेवणाची व्यवस्था कोरेगाव व सातारा येथे होऊ शकते.
राजेमहाडीक वाडा, तारळे
महाराष्ट्र ! म्हणजे असे राष्ट्र की, विश्ववंदनीय छ. शिवाजी महाराज याच भूमीतील सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या अमलाखाली होता. येथील रयत आक्रमकांच्या जुलमाने त्रासली होती, पण तिचे रक्षण करणारा कोणीही त्राता नव्हता. आया बहिणींची भरदिवसा ढवळ्या अब्रू लुटली जात होती तर देव व मंदिरे उद्ध्वस्त करून धर्म बुडवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हिंदूद्वेष्ठ्या आक्रमक सत्तेकडून होत होता. येथे अनेक कर्तृत्ववान, महापराक्रमी योद्धे होते पण ते आक्रमक सत्तेच्या पदरी नामजाद सरदार म्हणून नोकरीस होते. पराक्रम करायचा तो आपल्या बादशाहाच्या तिजोरीत जास्तीतजास्त नकद व मुलूख पडावा म्हणूनच. अशावेळी वेरुळच्या भोसले घराण्याचा एक धोरणी, पराक्रमी शूर योद्धा शाहजीराजे हे विजापूच्या अदिलशाहा बादशाहाच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर येथे कारभार पाहत होते. त्यांना महाराष्ट्रातील स्वकियांची काळजी वाटत होती. स्वराज्य संकल्पक शाहजी राजांनी एकदा मराठी रयतेसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता. अशावेळी त्यांनी आपल्या पुण्याच्या जाहगिरीवर छ. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ सह मोकासदार म्हणून पाठविले. जे आदिलशाहाच्या सेवेत राहून त्यांना करता येणार नाही ते मुलाकडून व्हावे हीच अपेक्षा व तशी खात्री देखील होती.
छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय. या घराण्याचा उल्लेख कविंद्र परमानंद नेवासकर यांच्या ' शिवभारत ' मधे येतो तो असा,
" महाडिक परशुराम दुजे सत्याकुली नव || "
महामानी महाडिके फत्ते खानास गांठू दे ||"
हे घराणे मूळचे कोकणातील होय. त्यांच्या पूर्वजांकडे महाड बंदराचे वतन व देशमुखी तसेच, खेड बंदराची मोकादमी मिळाल्यामुळे त्यांना ' महाडिक ' हे उपनाम मिळाले. त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही १६५० ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत होते. परसोजीराजें कर्तृत्व व निष्ठा शाहजीशी एकरुप झाली होती. कानोजीराजे महाडिकांचे शौर्य, मुत्सदीपणा परसोजींच्या रक्तात पित्याप्रमाणे होता. परसोजींच्या मृत्यूनंतर हरजीराजे हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले. शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दिल्या होत्या
शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले.
छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराज गादीवर आले. छ. संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, दादाजी काकडे हे सैन्यासह कर्नाटकात १६८१ गेले. स्वतः कर्नाटकात लक्ष घालावयास छ. संभाजी राजांना वेळ नसल्यामुळे त्यांनी हरजींना कर्नाटकाचे सर्वाधिकार आणि कर्नाटकातील सर्व गडकोटांचा अधिकार सोपविला होता. म्हैसूरचा सेनापति कुमारय्या याचा हरजींनी पराभव करून मदुरैच्या नायकाचा भरासाच भाग स्वराज्यात दाखल केला. पुढे मराठी सैन्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने हरजींची सत्ता पूर्व कर्नाटकात इतकी वाढली की ते सर्वसत्ताधिश झाले. जिंजी, अर्काट आणि भोवतालचा प्रदेश मराठ्यांचा ताब्यात होता.इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्काटपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला . हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग,
मुघलांनी छ. संभाजी राजांना पकडल्याची बातमी ऐकताच ९ - ३ - १६८९ रोजी केशव त्रिमल यांस त्रिणामली येथे हरजींने कैद केले. हरजीराजे व केशव त्रिमल यांच्यामधे कर्नाटकातील प्रमुखपदासाठी संघर्ष असला तरी दोघेही छ. संभाजी महाराजांशी अतिशय प्रामाणिक होते. हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहमदनगर जवळील भिंगार येथे मृत्यू झाल्यानंतर छ. संभाजी पुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना काही अटीवर मोगलांनी मुक्त केले. छ. शाहू महाराजांनी सातारा येथे आपली राजधानी निर्माण केली. छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला.भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इ. स. १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ‘शृंगारपूर’ येथील वाड्यात झाला. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या! छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वांत धाकट्या कन्या. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली.शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या.
१७०९ साली छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.शंकराजीराजे महाडिक यांनी स्वराज्याची सेवा करीत असताना १७२८ मध्ये देह ठेवला. त्यावेळी तारळे गावच्या तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीराणी सती गेल्या. भवानीराणी व शंकराजी यांना दुर्गोजी व अंबाजी असे दोन पुत्र होते. दुर्गोजी हे कोल्हापूर येथील स्वराज्याच्या दुसऱ्या गादीच्या संभाजींच्या चाकरीत होते तर, धाकटे अंबाजी हे सातारा छत्रपति यांच्या सेवेत होते. याच घराण्यातील भवानजी हे छत्रपति प्रतापसिंहांच्या काळात सातारा गादीच्या सेवेत होते.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे
तारळे गावाच्या नावाला प्राचीन इतिहास आहे. तारकासुर राक्षसाच्या संकटातून तारले म्हणून तारळे हे नाव मिळाले असावे. या गावामुळे आजूबाजूच्या इतर खेडेगावांचे मिळून तारळे खोरे हे संबोधन प्राप्त झाले आहे. परिसरातील कडवे येथे पांडव लेणी व रामघळ आहे, खवाळवाडीच्या डोंगरावर विंध्यवासिनीदेवीचे मंदिर आहे. तारळे गावाच्या पूर्वेला असलेल्या पाल येथे भक्तांचे दुःख हरण करणारा खंडोबा देवस्थान, दक्षिणेस चाफळ गावी प्रभू श्रीराम मंदिर तर उत्तरेस समर्थ रामदासस्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे. या आठ वाड्यांचे प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेला असून मात्र या सर्व वाड्यांचे परसदार एकाच चौकात होते. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. काळ बदलला असला तरी आपला गौरवशाली इतिहास सांभाळणा-या श्री.विजयसिंह काकासाहेब राजेमहाडिक, धैर्यशिल राजेमहाडिक व इतर वंशजांनी खूप मेहनत घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.
हरजीराजे महाडिकांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान फार मोलाचे असून त्यांच्या वारसदारांचे छ. शाहू राजांच्या काळातील योगदान तितकेच मोलाचे आहे त्याचा गौरवशाली वारसा तारळे येथे दिसून येतो. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या राजेमहाडिकांशी छत्रपति घराण्याने दोन वेळा आपल्या मुलींचा विवाह केला ते त्या गुणवत्तेचे असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. धन्य हरजीराजे, ज्यांनी सलग स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या सेवेत राहून आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्नेह, प्रेम व विश्वास मिळविला.
शंभु कन्या -- भवानीबाई राजेमहाडिक यांची समाधी तारळे जि.सातारा
प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण (d2chavan@gmail.com)
मराठा साम्राज्याचे सर सेनापती हरजीराजे राजेमहाडिक यांनी स्वतःचे प्राण तळहातावर घेवून स्वराज्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.त्यांची शुर वीरता पाहूनच छ.शिवरायांनी १६६८ मध्ये आपली कन्या अंबिकाबाई हीचा विवाह हरजीराज्यांशी लावून दिला. शिवरायांनी दक्षिण मोहीम जिंकल्या वर तेथील जबाबदारी हरजीराजांवर सोपवली .शिवरायांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी दक्षिणेतील जबाबदारी हरजीराजांकडेच ठेवली.
छ. संभाजी महाराज व येसूबाईसाहेब यांची कन्या भवानीबाई यांचा विवाह हरजीराजे यांचे पुत्र शंकराजीराजे यांचेशी झाला. छ. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला असताना हरजीराजे व शंकराजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्यासाठी मोठा पराक्रम केला.त्यामुळे छ.शाहू महाराजांनी आपले मेहुणे शंकराजीराजे यांना चार हजारी मनसबदार केले. आपल्या भगिनी भवानीबाई यांना तारळे महाला अंतर्गत २४ गावे , ७२ वाड्या व पाचही वतनाची सनद करून दिली.सनदे नुसार शंकराजीराजे आणि भवानीबाई तारळ्यास आले.त्या अगोदर मोंगलानी तारळे महालाची वाताहत केली होती.त्या वेळी शंकराजीराजे आणि भवानीबाई यांनी तारळे महालावर आपला अंमल बसवून विस्कटलेली घडी पुन्हा बसवली .
पुढे शंकराजीराजे यांचे १७२८ मध्ये निधन झाले.त्यावेळी त्यांच्या बरोबर भवानीबाई सती गेल्या. तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशान भूमीत तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीबाई यांची समाधी आहे. ती पहाण्यासाठी इतिहासप्रेमी आजही येतात.या समाधीवर छप्पर बांधण्याचा त्यांच्या वंशजांचा मनोदय आहे.
कडवेतील प्राचीन शिवमंदिर
एरवीच्या वहिवाटीच्या, मळलेल्या वाटा सोडून गवसत जाणाऱ्या अनवट, अपरिचित वाटा मनाला विलक्षण आनंद देतात. त्यादृष्टीनं खेडोपाडी, डोंगराच्या अवतीभवती, शांत, निवांत अन् रम्य ठिकाणी कितीतरी स्थळं दडलेली दिसतात. पाटण तालुक्यातील कडवे बुद्रूक इथलं प्राचीन महादेव मंदिर हे त्यापैकीच एक.
नागठाण्यातून तारळेला जाताना अलीकडंच कडवेला जाणारा फाटा फुटतो. कोंजवडेतून सरळ पुढं जाणारा रस्ता मुरुडच्या तारळी धरणाकडं जातो. आपण मात्र काटेवाडीतून उजव्या हाताला वळायचं. काही अंतरावरच भुडकेवाडी लागते. रस्त्यालगतच भव्य हुतात्मा स्मारक आहे. पुढची सरळ वाट आपल्याला कडवे गावात घेऊन जाते. गावाला डोंगराची, पवनचक्क्यांची सोबत लाभली आहे. इथलं ग्रामदैवत पावणाई देवीचं मंदिरही भव्य आहे. तिथूनच काही अंतरावर महादेव मंदिर आहे. ते अत्यंत प्राचीन, पुरातन आहे.अखंड पाषाणात कोरलेल्या या मंदिराविषयी विविध आख्यायिका ऐकावयास मिळतात. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात.
मुख्य गाभाऱ्यासह दोन ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहेत.मंदिरालगत पाषाणात कोरलेल्या गुहा आहेत. त्यातही विविध देवदेवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. सभामंडपातील दगडी खांब लक्षवेधक आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. सभामंडपाच्या पूर्वेला सूर्यदेवतेची अन् पश्चिमेला विष्णूच्या मूर्तीवर सुर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर छिद्र ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या मागे दगडातच विहीर अवशेष नजरेस पडतात. हे मंदिर ओढ्याच्या काठावर आहे. थोरला ओढा या नावानं तो ओळखला जातो. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळं, सभोवतालच्या वनराईमुळं परिसराच्या सोैंदर्यात भर पडते. निर्जन परिसरामुळं शांततेची अनुभूती लाभते.मंदिर परिसरात भुयार असल्याची शक्यताही ग्रामस्थ व्यक्त करतात. शिवकाळात इथं छुपा मार्ग असावा, असंही सांगितलं जातं. शिवरात्रीला मंदिरात धार्मिक उत्सव असतात.
परिसरात आणखीही मनाला भुरळ घालणारी स्थानं आहेत. तारळी धरण, तोंडोशीची रामघळ, जळवचं मंदिर अन् खिंड, तारळेतील ऐतिहासिक वाडे, खंडोबाची पाली ही त्यापैकीच. पवनचक्क्यांच्या ‘जंगला’तून सडा वाघापूरमार्गे पाटणला जाणारा रस्ता आहे. ठोसेघर, चाळकेवाडीकडं घेऊन जाणारे विविध घाटमार्गही आहेत. एक दिवसाची ही अगदी अल्पखर्चिक छोटी सहल मनाला नक्कीच आनंद देणारी ठरते.
खंडोबाची पाली:-
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्र्रातील सातारा या जिल्यात आहे . शंकराचे अवतार असणारा पाल खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात. तारळी नदीच्या दोन्ही काठांवर पाल गाव वसले आहे. येथे जाण्यासाठी सातारा व कराडहून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची सोय आहे. याचे मूळ नाव राजापूर होते, पण खंडोबाची निष्ठावान सेविका पालाई गवळण हिच्या नावावरून या गावाचे नाव पालाई-पाली-पाल असे झाले असावे.मराठी अंमलात पाल हे बाजारपेठेचे प्रसिद्ध ठिकाण होते.
पौष शुद्ध त्रयोदशीपासून (जानेवारी महिन्यात ) येथे ४-५ दिवस यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील भाविक लोक मोठ्या संख्येने येतात. त्यांत मुख्यतः मुंबईचे कोळी लोक व मांग-रामोशी असतात. यात्रेच्या वेळी खंडोबा व म्हाळसा यांचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या वेळी भाविक लोक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक वाघ्यामुरळी बनणे, पशू बळी देणे व भंडारखोबरे उधळणे इ. विधी करतात.
खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो .
खंडोबाच्या लग्नकथा
एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात
सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले, तीच म्हाळसा. तिने नेवाश्याच्या तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले.स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
म्हाळसा व महाळसाकांत पालीहून गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येह्ते देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात.
पाली खंडोबा मूर्ती
रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने
महाराष्ट्र :
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) माळेगाव
५) सातारे (औरंगाबाद)
६) शेंगूड (अहमदनगर)
७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद)
८) वाटंबरे
पालीच्या खंडोबाची यात्रा
खंडोबाचे सिहासन
येथील खंडोबाचे मंदिर आबा पाढोदे नावाच्या वाण्याने सु. ५०० वर्षा पूर्वी बांधले.
पाली हे गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरा पासून तीस किमी अंतरावर आहे सातारा – कराड मार्गावरील अतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते गाडी रस्ता थेट मंदिराचे दक्षिण द्वारात पोहोचतो, हे दक्षिणद्वार यमाजी शिवदेव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण मंदिराचे बाह्य कोटात पोहोचतो .दक्षिणद्वाराचे पुर्व बाजूस नगारखाना असून शेजारीच हत्तीखाना आहे. येथील हत्ती वरून देवाचे लग्न वेळेस मिरवणूक निघते.येथील बाह्य आवार दगडी आहे.
या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते, या दक्षिण द्वारातून आत गेले की लगेच पुर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे. तर द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे. ओवारीच्या एका खांबावर गणेश खंडो व महीपत खंडो पारगावकर यांचा ईस १७७२ चा शिलालेख आहे, हे बांधकाम या काळी झाले असे दिसते. मंदिराचा संपूर्ण कोट चहुबाजूंनी ओवऱ्यानी युक्त असून त्याची उंची सुमारे २० फुट आहे कोटाची पुर्व पश्चिम लांबी सुमारे १४० फुट व दक्षिण उत्तर लांबी ८० फुट आहे .कोटास दक्षिण, पुर्व, उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव. घोरपडे, इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे.
कोटाचे पुर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा या दरवाजाचे बाह्य बाजूस दक्षिणेकडे एका चोथऱ्या वर पादुका आहेत. पुर्व दरवाज्या अलीकडे अलीकडे खंडोबाचे अश्वारूढ शिल्प बसवले आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की
उत्तर बाजूस एका मेघडम्बरीत पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा दिसते
या नंदी मंडपीच्या पुढे शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे, यती मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे .
या पुढे दिसतो तो पूर्वाभिमुख मंदिराचा सोळाखांबी मंडप या मंडपाचे सर्व खांब पितळी पत्र्याने मढवलेले आहेत, त्यावर काही चित्रे काढलेली आहेत, येथी फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख आहे .
मंडपाचे पश्चिमेस मुख मंडप असून या मंडपात दक्षिण बाजूस गणेश प्रतिमा आहे. तर उत्तर बाजूस एक छोटा दरवाजा आहे. मध्यभागी गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. येथील फरशीवर पडलोजी आबा बिन बावसेठी करदोई असा लेख आहे.
गर्भगृहाच्या दरवाज्याचे उंबऱ्यावर एक स्त्री मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्या मुळेच देव येथे आले तिचे हे स्मारक
मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यभागी ०.०९ चौ.मी. मेघडंबरी असून तीमधील शाळुंकेवर खंडोबा व म्हाळसा यांची दोन प्रेक्षणीय स्वयंभू लिंगे आहेत. या लिंगा पुढे तिवई च्या आधारे गादीवर मुखवटे ठेऊन सजावट केलेली दिसते या योनी मागे महिरप ठेवलेली आहे. तिचे पाठी मागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हेगाडीची असल्याचे सांगतात.मेघडंबरीच्या उजव्या हाताला म्हणजे योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बाणाई या खंडोबाच्या द्वितीय भार्येची हात जोडलेली उभी मूर्ती आहे.
. गाभाऱ्यापुढे धनाजी जाधव याने ६ चौरस मीटरचा सोळाखांबी मंडप बांधला. या मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात गणपती व उजव्या कोपऱ्यात विंध्यवासिनी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य शिखर जमिनीपासून सु. १५.५ मी. उंच आहे. यांची शिखरे मातीच्या विटांची असून त्यांवरील देवदेवतांच्या मूर्ती चे अलंकरण चुनेगच्चीत आढळते. या मंदिराच्या पूर्व दारासमोर खंडोबाचे एक लहानसे मंदिर आहे. त्यातील चतुर्भुज मूर्ती बैठी असून तिच्या हातांत खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र ही आयुधे आहेत. मूर्तीच्या मांड्यांखाली मणी व मल्ल यांची मस्तके आहेत. या मंदिराच्या बांधकाम शैली वरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिरास खेटून एक मंडपी असून त्या मध्ये पंचलिंगाची स्थापना केलेली आहे.
कोटाचे आत मध्ये नेरुत्या बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून आत मध्ये एक उभ्या पुरुष्याची प्रतिमा आहे हिचे उजव्या अंगास अडोजी बिन कृष्णाजी सावंत असा लेख आहे. ही प्रतिमा ह्या व्यक्तीने स्थापन केली असावी. मंदिराच्या पाठभिंतीस एक पश्चिमाभिमुख मेघडम्बरी असून त्या मध्ये भवानीची स्थापना केलेली आहे. हिला सिद्धवासिनी असेही म्हणतात. मुख्य मंदिराचे वायव्य बाजूस कोटाचे आतील बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून ती मध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे. या मागे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिराचे उत्तर बाजूस दरवाजा असून तो आकाराने लहान आहे या दरवाज्यातून बाहेरील बाजूस एक वापी आहे
. उत्तरतटाचे पुर्व बाजूस तटाला खेटून हवालदाराची स्थापना केलेली आहे
मंदिराचे कोटा पासून थोड्या अंतरावरून तारळी नदी वाहते यात्रा उत्सवाचे वेळी नदीचा परिसर दुकाने यात्रेकरू व वाघ्या मुरुळीच्या गायन वादनाने दुमदुमून जातो.
खंडोबा म्हाळसा विवाह यात्रा
पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो, तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरा मधून विवाह साठी प्रस्थान होते हत्ती वरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळनीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस दृष केवळ अवर्णनीय. गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारळी नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समुह केवळ सुवर्णच नदीच्य पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते. लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळनी करण्यात येते. या वेळेस भरणारी यात्रा सुमारे १५ दिवस चालते .
सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती २,५०० असून तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भाक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सदा देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.
निसर्गरम्य जळव!
सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भरभरुन लाभलेलं निसर्गाचं वरदान. समृद्ध अन् संपन्न हिरवाई. अर्थात असं असूनही भटकंतीच्या वाटा शोधताना कास- ठोसेघरच्या पलिकडं आपल्या नजरा फारशा पोहचत नाहीत. त्यामुळं अशी कितीतरी निसर्गरम्य स्थळं आपल्या नजरेआडच राहतात.
पाटण तालुक्यातलं जळवचा परिसर असाच काहीसा प्रसिद्धीच्या पटापलिकडं राहिलेला.जळव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तिथलं जोतिबाचं देवस्थान हजारों भाविकांचं श्रद्धास्थान.प्रथम महामार्गावरील नागठाणे. तिथून पश्चिमेस तारळे. शिवकालीन इतिहासाच्या स्मृती या गावात बद्ध आहेत. तारळेतून पुढं विविध रस्ते आहेत. ढोरोशी- मरळोशीतून पुढं जळवला जाता येतं.‘बालभारती’चे संचालक मा. सुनील मगर हे ढोरोशी गावचेच कर्तबगार, कर्तृत्ववान सुपुत्र. ‘संस्कारदीप’च्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेले
ढोरोशीतून पुढं घाटरस्ता. अवघड वळणं, सरळ चढ अन् येताना तीव्र उतार. त्यामुळं घाट आपली नक्कीच परीक्षा पाहतो. घाटातून वर जाता जाता ‘टिपीकल कोकणा’चं दर्शन घडतं. आंबा, फणस, जांभूळाची इथं असंख्य झाडं आहेत. करवंदाच्या जाळ्या तर अमाप.
वरच्या सपाटीला जळव येतं. समोरच भव्य मंदिर. आरंभीचं दगडी बांधकाम भक्कम आहे. अलिकडंच त्याला नवं रुप लाभलं आहे. भाविकांची सदैव वर्दळ दिसते. मंदिरामागं जाणारा एक रस्ता पाटणला जातो अन् दुसरा कळंबेला. पठारावर हजारों पवनचक्क्यांची पाती अहोरात्र भिरभिरत असतात. वारा अखंड वेगात वाहतो. भोवताल हिरवागर्द भासतो.
कळंबेत गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. इथं कळंबेत दिनेशगिरी महाराज मठाधिपती आहेत. कळंबेतून जांभे, चिखली, चाळकेवाडी करुन ठोसेघरला जाता येतं. जळवमधून पाटणलाही जाणारी डांबरी सडक आहे. तोंडोशीची प्रसिद्ध रामघळ अन् मुरुडचं तारळी धरण नजीकच आहे. हल्ली जिथं- तिथं रस्ते झाले आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगाही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळं या पावसाळ्यात अंगावर पाऊस झेलायचा असेल, शरीर हलवणारा वारा अनुभवायचा असेल तर जळव परिसराचं स्थळ आतापासूनच मनात अवश्य पक्कं करा !
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा
निसर्गरम्य जळव खिंड
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाची नानाविध रुपं पहावयास मिळतात. सृष्टीसोैंदर्याच्या पलीकडं असलेल्या अदभूततेची प्रचिती येते. ही आगळी, विलक्षण रुपं पाहताना मन थक्क होतं. इतिहासप्रसिद्ध तारळे गावातून पश्चिमेस जाणारी वळणावळणाची घाटातली वाट थेट डोंगरमाथ्यावर जाते. तिथंच जोतिबा जळव हे प्रसिद्ध देवस्थान आहे. मग काही अंतरावरच जळवची खिंड. अलीकडच्या काळात या खिंडीमुळं पाटण हे तालुक्याचं ठिकाण गाठणं अगदीच सुकर बनलं आहे.
या खिंडीच्या डाव्या बाजूनं डोंगराच्या सड्यावर अर्थात पठारावर जाणारी वाट आहे. डोंगराला पडलेली प्रचंड भेग म्हणजे ही वाट. सुमारे 40 ते 50 फूट लांबीची ही भेग. वर जाण्यासाठी जागोजागी दगडी पायऱ्यांची रचना आहे. तिथं उभं राहून प्रचंड वेगानं येणारं वारं अंगावर घेणं हा सुखद क्षण असतो. जेमतेम एक माणूस ये-जा करु शकेल अशी ही भेग. तिथून पठारावर गेल्यावर शेकडो पवनचक्क्या आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. दूरवर सदाहरित जंगल दिसतं.
जळव खिंड ओलांडून पलीकडं गेल्यानंतर आणखीही रम्य ठिकाणं गवसतात. गगनगिरी महाराजांचं मणदुरे हे गाव नजीकच आहे. त्यांच्या वाड्याचे अवशेष गावात आहेत. जानाईदेवीचं माहात्म्य लाभलेलं निवकणे याच परिसरात. निसर्गपूजेसाठी प्रसिद्ध असलेलं काऊदरा हे ठिकाण इथलंच. म्हारवंड, भारसाखळे, चाफोली यासारखी निसर्गसंपन्न गावं कोकणाची आठवण करून देतात. सुंदरगड किल्ला, धारेश्वरचं मंदिर, पवनचक्क्यांचं वनकुसवडे याकडं जाणारे मार्गदेखील आपल्याला खुणावत राहतात. खिंडीच्या अलीकडं असलेल्या कळंबे गावातही गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. पुढं चाळकेवाडी, ठोसेघरकडं जाणारी डांबरी सडक आहे. काही अंतरावर तोंडोशीची रामघळ अन् तारळी धरणाचा विहंगम परिसर आहे.
सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा मोबाईल । 98224 54630
टोळेवाडीचा नाकिंदाचा बोगदा :-
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात नागठाण्याजवळच्या टोळेवाडीजवळ असणारा नाकिंदाचा बोगदा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल.इथे डोंगरामध्ये नेढे तयार झालेले आहे.महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर डोंगराला आरपार पडलेली छिद्र उर्फ नेढी बघायला मिळतात.किल्ल्यावर दुर्गप्रेमी आणि पर्यटकांची वर्दळ असल्याने हि नेढी सुपरिचित असतात.मात्र टोळेवाडी गावाच्या हद्दीत असणारा हा नाकिंदाचा बोगदा मात्र अप्रसिध्द आहे. सातारा जिल्ह्यात एका दिवसाच्या भटकंतीसाठी आदर्श अशी अनेक ठिकाणे आहेत्,त्यात समावेश होउ शकणार्या या ठिकाणाविषयी कोणाला फार माहिती नाही,नागठाण्यावरुन निनाम, कुसवडे मार्गे आसनगाव व तिथून परमाळे घाट चढून गेले कि पठार लागते.या पठारावरुन वेडीवाकडी वळणे घेत रस्ता डोंगरझाडीतून टोळेवाडीत पोहचतो.टोळेवाडीपासून दोन कि.मी.ची दमछाक करणारी चढण आहे.या मार्गे आपण बोगद्याजवळ पोहचतो.लांब पसरलेल्या पठाराच्या टोकाला हे नेढ आहे.साधारण साठ फुट रुंदीचे हे नेढ लाव्हा रस शांत होताना झालेल्या घडामोडीतून तयार झाले आहे, स्थानिकांच्या समजुतीनुसार मात्र भीमाच्या प्रचंड ताकदीतून हा बोगदा तयार झाला अशी मान्यता आहे.या नेढ्याजवळ काही अंतरावर भैरवनाथाचे मंदीर आहे.दरवर्षी इथे यात्रा भरते.बहुधा हे निसर्ग नवल सामान्य लोकांनी बघावे म्हणून कदाचित आपल्या पुर्वजांनी अश्या जत्रा,यात्रांची योजना केली असावी. या नेढ्यात उभारले कि तनमनाला विलक्षण थंडावा जाणवतो. एका बाजुला तारळे ,मुरुडचा पाटण तालुक्यातील परिसर तर उत्तर बाजुला अजिंक्यतारा,शेंद्रे कारखाना हा परिसर दिसतो.इथे जाण्यासाठी डांबरी रस्त्याची सोय झाली आहे. इथून थेट चाळकेवाडी,ठोसेघरकडे जाता येते.या नेढ्याच्या परिसरात पवनचक्क्या,परमाळेतील नैसर्गिक पाण्याचे झरे,कांजाईदेवी ( कोंदणी) वाघजाईदेवी ( परमा़ळे ) माकडजाई ( मानेवाडी ) अशी देवस्थाने परिसरात आहेत. एकंदरीत ज्यांना अनवट ठिकाणे बघायची आहेत्,त्यांनी जरुर या नाकिंद्याला भेट द्या.इथे येण्यासाठी जसा नागठाण्याकडून रस्ता आहे तसाच शेंद्रे,वेचले,कुमठे किंवा सातार्याकडून बोगदा मार्गे सोनगाव,कुमठे,परमाळे असे ३० ते ४० कि.मी.अंतर आहे.
चाफळचे श्रीराम मंदिर
सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.
समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव समर्थ संप्रदायाच्या मठाचे मुख्य स्थान होऊन गेले. अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.
समर्थांनी बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडकळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर 1967 मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या. मुंबईचे उद्योगपती अरविंद मफतलाल भूकंपग्रस्त भागाच्या पाहणी पथकासोबत चाफळला मार्च 1968मध्ये आले. त्यांनी त्या मंदिराची बिकट अवस्था पहिली आणि त्याचा जोर्णोद्धार केला. नव्या मंदीराचे बांधकाम 1972 साली पूर्ण झाले. मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली.
चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.
मंदिराच्या गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत असते. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहे. मूळ मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात.
समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून क-हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. चाफळच्या राममंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक 'दास मारुती'चे मंदिर आहे. त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे. मूर्तीच्या चेह-यावर विनम्र भाव आहेत. त्या मारूतीसाठी बांधलेले मंदिर सुस्थितीत आहे. गावात आलेल्या 1968 सालच्या भूकंपातदेखील हे मंदिर सुरक्षीत राहिले. राममंदिराच्या मागे उंचवट्यावर 'प्रताप मारुती'चे मंदिर आहे. त्यास भीममारूती किंवा वीरमारूती अशा नावांनी ओळखले जाते. त्या मंदिराचे शिखर पन्नास फूट उंच आहे. शिखराचे शिल्पकाम आकर्षक आहे. त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी 'भीमरूपी महारूद्रा' या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.
मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्याच्या आवारात समर्थांची ध्यानगुंफा आणि समर्थांचे अस्थीवृंदावन आहे. मंदिर परिसरात सभागृह, समर्थांची पंचधातूची मूर्ती, उत्तर व दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट, म्हसोबा मंदिर, नरसोबा मंदिर, रामरथ मंदिर व महारुद्र स्वामी समाधी मंदिर या वास्तूदेखील आहेत.
चाफळच्या राममंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एक घळी आहे. त्या घळीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते. ती घळ 'रामघळ' या नावाने ओळखली जाते. त्या घळीतून राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे, की...
"दास डोंगरी राहतो,
यात्रा रामाची पाहतो।
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे।।''
चाफळचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरांची देखरेख 'श्रीराम देवस्थान ट्रस्ट'मार्फत केली जाते. ट्रस्टकडून भाविकांसाठी तसेच मुलांवर संस्कार घडवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था होते.
चाफळ गावापासून जवळच शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट घडली होती. त्या ऐतिहासिक घटनेप्रित्यर्थ तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. चाफळ गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बडोदा संस्थानाचे राजकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांचे जन्मस्थान आहे. पेंढरकर यांना गौरवाने 'महाराष्ट्रकवी' असे म्हटले जाई. पेंढरकर यांच्या नावाचा उल्लेख 'रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत अग्रक्रमाने केला जात असे.
- संतोष अशोक तुपे
चाफळचा वीर मारुती सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उंब्रजवरून जेमतेम ११ किमी वर चाफळ आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थानी चाफळ इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इस १६४९मध्ये समर्थानी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. जणू काही प्रभूरामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते. प्रताप मारुती/भीम मारुती/वीर मारुती चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे १०० मीटर चालत जावे. तिथे रामदासस्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आजही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडिले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणताहेत, नेटका, सडपातळ, डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो आहे अशा रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे. दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केलेली दिसते. माजगावचा मारुती चाफळपासून फक्त तीन किमी अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्टय़ आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे १०० चौरस फूट लांबी-रुंदीचे, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळा भरते. शिंगणवाडीचा मारुती यालाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थाची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. याच ठिकाणी शके १५७१ अर्थात इ.स. १६५० मध्ये समर्थानी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत म्हणजे उगारलेल्या स्थितीत आहे. सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर ११ मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही परंतु आजूबाजूला दाट वृक्ष मात्र आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठीसुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबडय़ा रंगाने रंगवलेला असल्याने लांबूनसुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थाचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. या टेकडीवर जाण्यासाठी चारचाकी वाहन जाईल ईतका रस्ता केला आहे. मात्र रस्ता विलक्षण कच्चा असल्याने स्वतःचे कारसारखे वाहन असेल न नेणेच योग्य होईल.
एखाद्या स्थानाशी निगडित कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते. त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीबद्दलसुद्धा काहीसे असेच आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगतात. जवळच सडा दाढोली गावाजवळ रामघळ आहे. हि शिवसमर्थ भेटीच्या ठिकाणापासून साधारण पंधरा कि.मी वर डोंगरात आहे. ईथे जाण्याचा रस्ता कच्चा आहे हे ध्यानी घेउन त्याप्रमाणे नियोजन करावे.याच रामघळीजवळ शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थानी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला, त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असे नाव मिळालेय.
सडा दाढोली :-
श्रावणसरी झेलताना संस्मरणीय ठरणारं, सदैव लक्षात राहणारं आणखी एक ठिकाण. उल्लेखनीय म्हणजे इतिहासाचा स्पर्श झालेलं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, हिरवाईची सोबत ल्यालेलं. तांबड्या मातीनं नटलेलं. संगतीला घाटातली वाट, खळाळतं पाणी, भाताची शेतं वगैरे!
कुबडीतीर्थ हे त्याचं नाव. तिथल्या रामघळीमुळं ते प्रसिद्ध झालं आहे. ते आहे सडा दाढोली (ता. पाटण) म्हणजेच समर्थनगर गावच्या कुशीत. साता-यातून सुमारे पाऊणशे किलोमीटर अंतर.
माझ्या भटकंतीचं तंत्र म्हणजे, ज्या मार्गानं जायचं, त्या मार्गानं पुन्हा यायचं नाही. नवनवे आसमंत धुंडाळता यावेत, नवनवे मार्ग कळावेत, नवनवी गावं टिपता यावीत हेच त्याचं प्रयोजन. त्याच हिशोबी सांगायचं तर, जाताना ‘हायवे’नं उंब्रज. तिथून उजव्या हातानं चाफळची वाट. पुन्हा परतीच्या वेळी सडा वाघापूर, तारळे, नागठाणेमार्गे ‘हायवे’ला येत साता-याची वाट धरायची.
चाफळ हे राज्यातलं प्रसिद्ध तीर्थ. तिथून पश्चिमेची डांबरी सडक धरायची. लगेचच शिंगणवाडीत ‘खडीचा मारुती’ मंदिर. काही अंतरावर उत्तर मांड प्रकल्प. निळंशार पाणी. बाजूला हिरवा डोंगर. अर्थात त्याच्या अलिकडंच गमेवाडी हे गाव येतं. तिथून भातशेतीची खाचरं न्याहाळत, नजरेत साठवत एक मोठं तीव्र वळण येतं. मग दाढोली!
दाढोलीतून पुढं सगळा घाट. चढण उंच जात राहणारी. हा रस्ता सडा वाघापूरकडं जातो. त्याचं एक टोक पाटणकडं तर दुसरं तारळेत जाऊन संपतं. आपण मध्ये येणाऱ्या कच्च्या रस्त्याची निवड करायची. तो थेट पठारावर जातो. जागोजागी आपली परीक्षा पाहतो. सारं शरीर हलवायला लावतो. आताच्या पावसात तर रस्त्याची आणखी त्रेधातिरपीट झालेली.
अर्थात पठारावर गेलं, की देहभान हरपतं. हिरवळीनं सजलेलं पठार पाहून मन हरखतं. तिथं शेकडो पवनचक्क्या स्वागतासाठी उभ्या दिसतात. मध्येच कुबडीतीर्थचं प्रवेशद्वार आहे. तिथूनच घळीत उतरायला दगडी पाय-या आहेत. शिवराय अन् रामदास यांच्या भेटीच्या स्मृती इथं प्रतिमेच्या रुपानं पहावयास मिळतात. परिसर आकर्षक आहे. तिथून खूप मोठं अवकाश नजरेत सामावतं.
पुन्हा खाली जायला पाय-या. ज्या भव्य शिळा आहेत, त्यांची नैसर्गिक रचना मोठी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. पुढं विस्तीर्ण प्रांगण. आणखी घळी. रामदास, जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या ध्यानगुंफा आहेत.
कुबडीतीर्थची भटकंती एक दिवसात पुरी होते.परिसरात फार सोयीसुविधा नाहीत. अर्थात त्याच्या अलिकडं माजगाव (ता. पाटण) इथं श्री.संतोष काटकर यांचं ‘समृध्दी’ नावाचं हाॅटेल आहे. तिथंला पाहुणचार आटोपून मग पुढं प्रवासाला निघता येतं.
भीम-कुंती भेटीचा सोहळा
प्रत्येक एतिहासिक गावात आपल्याला काहीतरी वैशिष्ट्यपुर्ण बघायला मिळते मग ते एखादी वास्तु असेल, परंपरा असेल किंवा एखादा उत्सव.पुणे बेंगळूरू अशियाई महामार्गावर वसलेल्या उंब्रजमध्ये अशीच एक वैशिष्ट्यपुर्ण प्रथा आहे जी इतरत्र पहायला मिळत नाही.हि प्रथा म्हणजे भीम-कुंती महोत्सव.थेट महाभारताशी नाते सांगणारी हि प्रथा नेमकी उंब्रजलाच का सुरु झाली ? फक्त भीम आणि कुंती यांचीच भेट का ? यात इतर पांडव का नाहीत ? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत, मात्र हा उत्सव कुतुहल जागवतो हे नक्कीच.बेंदरापासून उत्सव सुरू होतो. या उत्सवाची सुरुवात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भीमाच्या मूर्तीसाठीची लागणारी काळी माती आणण्याने होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी (सरता सोमवार) या उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी होणारी भीम-कुंती या मायलेकरांची भेट हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यासाठी भिमसेन मंडळ ग्रामस्थांनी स्थापन केले आहे. मातीच्या बनवलेल्या कुंती व भीमाच्या मुर्ती रथात घालून गावातून मिरवल्या जातात. रथाचा मान मिळणे हे भाग्याचे मानले जाते, त्यासाठी बोली लावली जाते.'भिमसेन महाराज की जय' 'कुंती माता की जय' जयघोषणांनी उंब्रज परिसर दुमदुमुन जातो.
उंब्रजचा मारुती/ मठातील मारुती चाफळचे दोन आणि माजगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उंब्रज इथे येतो. इथेच जवळ आता तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इथल्या मारुतीमंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानालासुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उंब्रज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. त्याच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे. अशी इथली एक आख्यायिका. समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० साली समर्थानी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदासस्वामींनी कीर्तन गेले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.
हा मारुती उंब्रज गावात पुर्वबाजुला बाजारपेठेत आहे. पुण्याच्या दिशेने तोंड असेल तर उजव्या हाताला उंब्रज गावाची मुख्य बाजारपेठ आहे. इथेच समर्थ स्थापित हनुमानाचे मंदिर आहे. इथे जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने शक्यतो चारचाकी वाहन असेल तर हायवे शेजारी पार्क करुन चालत जाणे बरे पडेल.
मसूरचा मारुती उंब्रजपासून जेमतेम दहा किमी वर असलेल्या मसूर इथे समर्थानी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडित एक कथा आहे. आणि ती कथा आहे कल्याणस्वामी या समर्थाच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थाना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थाचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी. चार वर्षे मसूर इथे समर्थानी रामनवमीचा उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्रीरामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थानी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंडय़ावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले! अंबाजीने काहीही न विचारता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रत्युत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे स्वामी.’ तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले. पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके १५६८ अर्थात इ.स. १६४६ साली याची स्थापना समर्थानी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरीत्या रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थाचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारीच नारायणमहाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे. या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पहिलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थानी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मनी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थानी इथेच यथेच्छ बदडून काढले होते, असे सांगितले जाते. शहापूरचा मारुती कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर आणि मसूरपासून तीन कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त एक कि.मी.वर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके १५६६ म्हणजेच इ.स. १६४५ साली समर्थानी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंडय़ाची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयेला दोन कि.मी.वर रांजणखिंड आहे. इथे दोन मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे. शहापूर.. समर्थ.. बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूरजवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तिथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला.. असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दु:खी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजीपंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून विजापूरला घेऊन गेले होते.
आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थानी सईबाईंना दिला. दासोपंत (म्हणजे समर्थच) विजापुरी जाऊन हिशेब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी परत आले!! त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती-पत्नींनी तीन दिवस कडकडीत उपास केले. चौथ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थदर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर आठ दिवस उपास घडला. त्यावेळी हे दांपत्य समर्थाना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थाना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थानी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनवधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय.. त्यांचे डोळेच दिपले. समर्थाच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थानी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे.
सडा वाघापुर उलट धबधबा :-
तुम्ही सरळ वाहणारे धबधबे खुप पाहिजे असतील, व त्याखाली मनमुराद भिजून ओलेचिंब होऊन आनंद घेतला असेल, पण तुम्ही उलटा वाहणारा धबधबा पाहिलाय का? पाटण शहरापासून अवघ्या बारा किलोमीटरवर सडावाघापूर गावच्या डोंगरपठारावर सह्याद्रीच्या कड्यावरून पावसाचे वाहणारे पाणी वार्याच्या प्रचंड दाबाने उलटे पडून धबधबा तयार झाला आहे. रिव्हर्स पॉइंट म्हणून हा वैशिष्टयपूर्ण धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पहायला राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. पवनचक्कीमुळे ओळखला जाणारा हा सडावाघापूरचा विस्तीर्ण डोंगर पठार आता रिव्हर्स पॉइंट म्हणून नावारूपाला येत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा धबधबा प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे.
तारळे- पाटण मार्गावर सुमारे १४ किलोमीटरवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दर वर्षी पावसाला सुरवात झाली, की पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात. जुलै व ऑगस्ट महिने सडावाघापूर पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास निर्माण करणारे ठरत असतात. त्यामुळे पठारावर दर वर्षी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी शेकडो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते; परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. कड्यावरून खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते. पावसाचा जोर व हवेचा दाब असल्यास त्यांना उलट्या धबधब्याचे डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक दृश्य अनुभवयास मिळते. अन्यथा धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटे- मोठे धबधबे यावरच समाधान मानावे लागते.
कसे जाल आणि काय काळजी घ्याल...
साताऱ्याकडून आल्यास सातारा- नागठाणे- तारळे- सडावाघापूर, तर कऱ्हाडकडून कऱ्हाड- पाटण- सडावाघापूर किंवा उंब्रजकडून उंब्रज- चाफळ- दाढोली- सडावाघापूर. तारळेपासून १४ किलोमीटर अंतर आहे. तारळे- पाटण बस आहे; पण स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. येथे हॉटेलची सोय नाही, तसेच पॉइंटकडे जाण्यासाठी दिशादर्शक नसल्याने गोंधळ उडतो. कड्याच्या बाजूस कोणतीही सुरक्षिततेचे साधन नसल्याने अती कड्याजवळ जाणे धोक्याचे ठरू शकते.
निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करणार पाटण तालुक्यातील सडावाघापुरचं पठार
आभाळाला साद घालणाऱ्या पणवचक्या आणि सुंदर निसर्ग तसेच निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या पाटण तालुक्यातील सडावाघापुरच्या पठारावर सुंदर फुल आली आहेत. मनमोहित करणार निसर्ग सौंदर्य येथे पहायला मिळत आहे. वीकएन्डसाठी फिरायला हे ठिकाण खूप मस्त आहे.
●सडावाघापुर,
पाटण तालुक्यामधील तारळे गावाच्या दक्षिणेकडील पठार.
सडावाघापुर ( सडा ) पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची खाण असलेलं हे ठिकाण प्रयत्नपासून थोडं लांबच राहील आहे.
सड्याच्या या पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी झाले असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यासव मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो. सडा पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते प्रसिध्द सडापठार आहे.
सडा पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे.
लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे सडा पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो.
या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे. महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो.
हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात.
बहुलेश्वर
बहुलेश्वर मंदिर आणि परिसर:-
कराड पाटण राज्यमार्गावर निसरे फाट्यापासून दक्षिणेस ९ किमी अंतरावर,निसरे गावापासून ५ कि.मी,, डोंगराच्या पायथ्याशी बहुले हे गाव वसले आहे.या गावचे वैशीष्ट म्हणजे शिवसागर जलाशयातून कोयना नदीपात्रात प्रवाही अस णाऱ्या पाण्याचा एक थेंबही न घेता विहीरीच्या पाण्यावर बागायत असणारे पाटण तालुक्यातील एकमेव गाव.या गावाच्या प्रारंभीच बहुलेश्वराचे अतिप्राचीन असे शिवमंदीर आहे.बहुलेश्वरांनी एका गुराख्याला दर्शन देऊन येथे लिगाची स्थापना करण्याची प्रेरणा दिली अशी आख्यायिका आहे.
सन ११८५ मध्ये श्रीकृष्णाचे वंशज समजल्या जाणाऱ्या यादव घराण्यातील रामदेवराय शंकरदेव सिंधणराजा यांनी त्याकाळी अनेक शिवमंदीरे उभारली व त्यांना परीस्थितीनुसार अनुकुल नावे दिली त्यापैकी हे एक मंदीर. हेमाडपंथीय बांधकामाचा एक अजब नमुनाआहे.संपूर्ण बांधकाम दगडातून केले आहे.मंदिर दगडी फरसबंधी चौथरयावर असून हा चौथरा जमिनीपासून १.२२ मीटर उंचीवर आहे. मंदिराचे मुख पूर्वेला असून सभोवताली दाट वटवृक्ष आहेत. मंदिराचे शिखर आधुनिक बांधणीचे असून दोनशे वर्षापूर्वी निगडीचे सावकार परशुराम नारायण अनगळ यांनी केले आहे.
मंदिराच्या गाभर्यातील भिंतीची जाडी ८० सेमी असून , गाभार २.४4 x २.४4 मीटर लांबीचा आहे. गाभार्यात मध्यभागी बहुलेश्वरचे लिंग आहे. यावर उत्तरेकडून सतत पाण्याची धार पडत असते. लिंगावर पडणारे पाणी गोमुखाद्वारे गाभार्याच्या बाहेर सोडले आहे. मंदिराचा सभामंडप पूर्व पश्चिम ५.४९ मीटर लांब आणि उत्तर दक्षिण ५.३४ मीटर रुंद आहे. मंडपाच्या छताची उंची २.३३ मीटर आहे. छताची बऱ्याच ठिकाणी दुरूस्ती झाल्याचे आढळते. मंदिराच्या मंडपात १६ स्तंभ आहेत त्यावर कोणतेही कोरीव काम नाही.दिर्घीकेच्या भिंतीत उत्तर व दक्षीणेला देवकोष्ठ आहेत. त्यात उत्तरेला मारुती तर दक्षीणेला गणपती आहे.
दगडातूनच शिवमुर्ती उत्तरमुर्ती स्तंभ द्वार शिखर सभामंडप चौकोनी षटकोनी अष्टकोनी आकाराचे नमुने तयार केले आहेत दगडी बांधकामात पाण्याची कुंडे मुर्ती नंदी पाण्याचा हौद दिपमाळा व तुळशीवृदामलन तयार केले आहे.हे पुर्वाभिमुखी मंदीर आहे.ठराविक काळात शिवपिंडीवर सुर्यकिरणे विशीष्ट पध्दतीने पडतात. शिवलिंगाशेजारी पार्वतीची मुर्ती आहे सुमारे २०० वर्षापुर्वी निगडी येथील सावकार श्री परशुराम नारायण अनगळ यांनी श्रध्देपोटी याशिखराचे बांधकाम केले आहे.प्रत्येक सोमवारी भावीक दर्शनासाठी येतात.फाल्गुन महीन्यात तुकाराम बिजेनिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावाने पार पडतो.श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. महाराष्ट्र शासनाने पर्यटनाचा क दर्जा दिला आहे. तरी या पवित्र तिर्थक्षेत्राचा लाभ जरूर घ्यावा
ता.पाटण जि. सातारा.
काळसड्याची विहीर :-
प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण (d2chavan@gmail.com)
कोकीसरे तालुका पाटण या गावच्या डोंगर माथ्यावर नितळ खडकाचे पठार आहे. या पठारावर गवळी नगर ,( गवळी वाडा ,) ही वस्ती आहे. या वस्ती पासून सुमारे ६०० ते ७०० मिटर अंतरावर खडकात कोरलेली पांडवकालीन विहीर आहे.या विहिरीला “ काळसड्याची विहीर “ असे म्हणतात.या विहिरीची खोली अंदाजे ६० ते ७० फूट असून व्यास सुमारे १० ते १२ फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी ऐसपैस अशा ६० पायऱ्या. आहेत.ही विहीर १९८० सालापर्यंत वापरात होती असे सांगितले जाते.
पाटण येथून कोकणात जाणे साठी पाटण , कोकीसरे , मळे , पाचगणी , संगमेश्वर असा पूर्वी मार्ग होता. देश व कोकण यांना जोडणारा हा मार्ग शिवकाला पासून सुरु होता.जेव्हा संभाजी महाराजांना मोंगल सेनेने संगमेश्वर ला पकडले तेव्हा त्यांना वरील मार्गानेच कराडला नेण्यात आले होते अशी इतिहासात नोंद आहे.
पूर्वी कोकणात मालाची ने आण करतांना लोकं या विहिरीतील पाण्याचा वापर करत असत. गवळी नगर चे लोक सुद्धा या विहिरीतील पाण्याचा वापर शेती साठी आणि पिण्यासाठी करत होते असे जाणकार लोकं सांगतात.परिसरातील शाळांच्या वनभोजन सहली सुद्धा या ठिकाणी होत असत.
सद्यस्थितीस या विहिरीत पाणी नाही. परंतू खोदकाम केल्यास पाणी साठा होऊ शकतो.या पांडव कालीन पुरातन विहिरीचा वारसा गवळी नगर ग्रामस्थांनी जपून ठेवला आहे. पुरातत्व विभागाने या विहिरीची देखभाल व डागडूजी करावी अशी ग्रामस्थ आणि पर्यटकांची माफक अपेक्षा आहे.
शिवलेणे रुद्रेश्र्वर -
प्रा. डी. डी. चव्हाण, पाटण (d2chavan@gmail.com)
कराड चिपळूण रस्त्यावर येराडवाडी पासून उत्तरेला डोंगराच्या मध्यावर शिवलेणे रुद्रेश्र्वर मंदिर आहे.पांडवांनी एका रात्रीत पहाटेचा कोंबडा आरवे पर्यंत हे मंदिर उभारले अशी आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिरात मध्यभागी शंभू महादेवाची पिंड आहे. या पिंडीच्या भोवती खांब असून बसण्यासाठी जागा आहे.मंदिराशेजारी भंडारा घर असून पूर्वेच्या बाजूस पाण्याचे कुंड आहे.पावसाळ्यात मंदिरावरील धबधबा खूप आकर्षक दिसतो.
रुद्रेश्र्वरचा भंडारा उत्सव श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी असतो.परिसरातील हजारो भाविक या उत्सवाच्या साठी येतात. रुद्रेशवर देवस्थानचे वतीने नाम सप्ताह ,पारायण सोहळा , महा अभिषेक , होमहवन , महाप्रसाद , भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दर सोमवारी ही दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते.
येराडवाडी ग्रामस्थांच्या वतीने येराडवाडी ते मंदिर अशी लाईट व्यवस्था केलेली आहे. डॉ. माने यांच्या आर्थिक सहकार्याने काही पायऱ्या बांधल्या आहेत.ट्रस्टचे माध्यमातून श्रमदानातून २०१२ मध्ये उर्वरित पायऱ्या बांधल्या आहेत.मोहन कदम यांच्या आर्थिक मदतीतून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाचे वतीने या देवस्थानला ,' क ' वर्ग दर्जा मिळाला आहे. ट्रस्ट चे वतीने भक्त निवास , उद्यान या सुविधा करण्याचा मनोदय आहे.
दिवशी धारेश्वर
पाटणच्या वायव्येस ११ कि.मी.वर असलेल्या नागोजीराव पाटणकरांच्या इनाम असलेल्या गावापासून दोन कि.मी.वर डोंगरात २१३ मीटर उंचीवर ६१ मीटर लांब , ११ मीटर रुंद व दोन ते अडीच मीटर उंच अशी भव्य गुहा आहे.यात धारेश्वर मंदिर आहे.या स्थानासंबंधी अशी आख्यायिका सांगितली जाते कि एका गुराख्याची गाय या ठिकाणी चोरुन दुध घालत असे.काही दिवसांनी या ठिकाणी एक स्वंयभु लिंग प्रगट झाले.यावरुन या स्थानास धारेश्वर नाव पडले.धारेश्वरच्या वाटेवर काही अंतरावर चार नंदी आहेत. गुहेत उत्तरेकडे मठ आहे.मठाच्या दक्षिणेस धारेश्वरचे स्वंयभु लिंग असून त्याच्या सभोवती तीन भिंती घालून छोटेसे मंदिर तयार केलेले आहे.त्यात शंकर्,पार्वती व वीरभद्राच्या मुर्ती आहेत.मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदीराच्य दक्षिणेस राम्,सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती दगडी सिंहासनावर आहेत.सीतेची मुर्ती संगमरवरी आहे.या मुर्तीच्या दक्षीणेस तोंड असलेले दोन नण्दी आहेत.रामाच्या मुर्तीजवळ पाच पांडवाच्या रेखीव मुर्ती आहेत. जवळ यात्रेकरुंसाठी खोल्या बांधल्या आहेत.राम,लक्ष्मणाच्या मुर्तीसमोर गुरुगादी आहे.त्या गादीबरोबर पुजार्याचे लग्न लागते. याचे पुजारी हे बहुसंख्येने जंगम आणि लिगायत असून अविवाहित असतात. तसेच येथे गुंफा व एक झरा आहे. पिडीभोवती चांदीचा मुखवटा आहे. दसरा व चौत्र पंचमीला येथे यात्रा भरते.गुहेच्या समोर पाण्याची धार पडत असल्याने वातावरण थंड असते,इथे बरेच आधुनिक बांधकाम केलेले असून वीजेची सोय आहे,
पाटणकर घराण्याचे धारेश्वर कुलदैवत असून त्यांच्या पुर्वजांनी इथेले दगडी सिंहासन केलेले आहे.त्यावर यशवंतराव बीन हिराजीराव पाटणकर व धारबाराव बीन हिरोजीराव पाटणकर हि व्यक्तीनामे कोरली आहेत.गुहेत एक भुयार आहे.
सुंदरगड ( घेरादातेगड )
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गडांशी सातवाहनांपासून छत्रपती शिवाजीमहाराजांपर्यंत अनेकांचं नातं आहे. ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास इतिहासकारांनी मांडला ते किल्ले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. मात्र इतिहासामध्ये महत्त्वाची कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक किल्ले प्रसिद्धीपासून वंचित राहिले. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
◆इतिहास :
पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती.अफ़जलखानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला.
इसवीसन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवीसन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विषेश सांगन्याची बाब ज्यानी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहीलेले रामचंद्र आमात्य बावडेकर याचे यागड़ावर तीन महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. याला दुसरे नाव गंतगिरी असेही म्हटले जाते.दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
◆ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्यावर जाण्यासाठी जाईचीवाडी वनकुसवडे मार्गे वाहनाने १४ कि.मी. अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते . किल्ल्याच्या पायथ्यालाच निसर्गरम्य परिसरात पाटणचे ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदिर आहे.गडाच्या पश्चिचम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. या गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. ती इतिहासकालीन शिल्प कलेची चुणूक दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे. अखंड खडकात विहिरीत उतरण्यासाठी ४१ पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. या पायऱ्या उतरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचे मंदिर खोदले आहे. त्याचा आकार सुमारे आठ फूट लांब, सात फूट रुंद सहा फूट उंच आहे. या मंदिरावरूनच या तलवार विहिरीची भव्यता जाणून येते. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.तलवार विहिरीची खोली किती हे सांगता येत नाही. मात्र वरून पाण्यात दगड टाकला की विशिष्ट आवाज येतो. हे ऐकून माहीत झाल्याने गडावर येणारा प्रत्येक माणूस विहिरीत दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि विहीर दगडाने भरून काढण्यास हातभार लावतो.तलवार विहिरीपासून जवळच गडावर प्रवेश केल्याबरोबर अखंड खडकात खोदलेले गणपती मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात उतरण्यासाठी २९ पायऱ्या उतराव्या लागतात. या मंदिरावर कोणतेही आच्छादन नाही. चौकोनी आकाराच्या खोदकामात उत्तर भिंतीवर दक्षिणाभिमुख गणपती व पूर्व भिंतीवर पश्चिमाभिमुख मारुती अशा मूर्ती आहेत. मारुतीच्या समोरच्या बाजूस दगडात कोरलेली कमान आणि भुयारी मार्ग आहे. मंदिराचे एक वैशिष्ट असं, की सूयोर्दय होत असताना सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्यकिरण मारुतीच्या मूर्तीवर येतात. अशा रचनेत खोदलेलं हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्प कलाकारांची बौद्धिकता जाणवून देतं. या व्यतिरिक्त गडावर आणखी काही इतिहासातील अवशेष आहेत. गडाच्या समोरच्या एक उंच टेकडी आहे. या टेकडीवरून गडाच्या आजू बाजूना पसरलेल्या निसर्गाचे विहंगम दृश्य पर्यटकांना न्याहाळता येतं. या टेकडीचा पूर्वी टेहळणी टेकडी म्हणून उपभोग केला जात होता. इथून कोयनेचा नागमोडी प्रवाह, पाटण शहर, पवनचक्की प्रकल्प, सह्यादीच्या अफाट पसरलेल्या रांगा पर्यटकांना आकर्षित करतात. या गडाचं दुसरं नाव आहे सुंदरगड, आपलं नाव सर्वार्थाने सिद्ध करणारा हा किल्ला पर्यटकांना खुणावतोय
◆गडावर जाण्याच्या वाटा :
दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्यता आहे
टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायर्यांच्या वाटेने गडावर पोहोचता येते. आधी वर्णन केलेल्या दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात.
गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्टर आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा १९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते. त्या बाजूस जाण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायर्या आहेत
कोयनानगर परिसराचे पर्यटन
ब्रिटीशांनी विकसित केलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सध्या खुपच लोकप्रिय झाले. मुंबई, पुणे येथून येणे सोयीचे असल्याने महाबळेश्वर गर्दीने ओसंडून जाउ लागले आणि अर्थातच ईथल्या सर्व सोयींचे दर गगनाला भिडले आणि महाबळेश्वर सर्वसामान्यांना आवाक्यात राहीले नाही. शिवाय पर्यावरणाच्या र्हासाने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने नवे महाबळेश्वर वसविण्याची संकल्पना पुढे आली. आणि कोयनानगर हे नाव आणि परिसर यासाठी आदर्श असल्याचे लक्षात आले. जे कोयनानगर एकेकाळी फक्त कोयना धरणामुळे आणि १९६७ ला झालेल्या भुकंपामुळे सर्वाना ओळखीचे होते, ते आता नव्याने कात टाकून पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. या कोयनानगर परिसराची आज भटकंती करायची आहे.
कोयना अभयारण्याविषयी :-
कोयना धरणाच्या पाणलोट परिसरात असलेलं हे जंगल धरणाचा शिवसागर जलाशय आणि कोकणात उतरणारा सह्याद्रीचा कडा यांत अडकलेलं जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर बघायला मिळतात. सातारा जिल्ह्यातल्या या जंगलाचा समावेश पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांत होतो. सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या या जंगलाला आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाला मिळून २०१० मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. जंगलाच्या एकूण भौगोलिक स्थितीमुळे या जंगलात जाण्याचा मार्ग सोपा नाही.
‘कोयना’चा कोणताही डोंगर चढून गेल्यावर जे सुंदर दृश्य दिसतं ते अवर्णनीयच. इतर जंगलांसारख्या इथं जिप्सी सफारी नाहीत. सह्याद्रीच्या अवघड भूप्रदेशामुळे इथं रस्ते तयार करणंही तसं अवघडच आहे.
कोयना जंगलाची आणखी एक खासियत म्हणजे असंख्य खोरी. जलाशयाच्या काठावर शिरशिंगे, अवसारी, मालदेव, करंजवडे, मालदेव, पाली, झुंगटी इत्यादी महत्त्वाची खोरी तर होतीच; पण त्याशिवाय या खोऱ्यांना लागून अनेक उपखोरीही होती. निबिड, घनदाट अरण्य मात्र सगळ्याच ठिकाणी असायचं. त्यामुळे गमतीत या जंगलाला ‘इंडियाज् ॲन्सर टू ॲमेझॉन’ असं म्हणायचो.
जैवविविधतेच्या बाबतीत कोयना अभयारण्य खूपच समृद्ध आहे. असंख्य प्रकारचे मोठे देशी वृक्ष, झुडपं, वेली, याशिवाय पक्षी, सस्तन प्राणी यांची मुबलक संख्या ‘कोयना’त आहे. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचं तर वैपुल्यच. अस्वलांची संख्या कोयनेत चांगल्या प्रमाणावर आहे. बिबटे, रानकुत्रे, सांबर, भेकर, पिसोरी, गवे, इत्यादी सस्तन प्राण्यांबरोबरच वाघाचीही इथं नोंद आहे. भौगोलिक प्रदेशाच्या ठेवणीमुळे आणि सलग मोठ्या गवताळ प्रदेशांच्या अभावामुळे चितळ हा प्राणी मात्र इथं नाही. लाएनाज म्हणजे राक्षसी वेलीच्या अजस्र वेली, एंटाडाच्या, ओंबळीच्या मोठ्या वेली यांमुळे जंगलाचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यामुळे जंगलाला एक वेगळंच घनगंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे.
व्याघ्रप्रकल्पाच्या दर्जा मिळाल्यावर वनविभागानं इथं गवताळ प्रदेशांच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शाकाहारी प्राण्यांची संख्या चांगल्या प्रमाणावर दिसायला लागली आहे. ‘दमट विषववृत्त सदाहरित जंगल’ या प्रकारामुळे एकंदरीत इथं प्राणी नजरेस पडणं कठीण असतं. जंगलातला काही भाग तर इतका घनदाट आहे की सूर्यप्रकाशही मोठ्या मुश्किलीनं जमिनीपर्यंत पोहोचतो. एकूणच या जंगलात फिरायचं म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची. व्याघ्रप्रकल्प झाल्यामुळे आता चालत फिरण्यावर निर्बंध आले आहेत; पण जंगलाचा काही भाग आजही फिरण्यासाठी वनविभागानं खुला ठेवला आहे. सह्याद्रीच्या रांगा आणि जलाशयाचा भाग यांच्या नैसर्गिक तटबंदीमुळे या जंगलाचं सौंदर्य अजूनही टिकून राहिलं आहे. यात वनविभागाच्या प्रयत्नांचाही उल्लेख करावा लागेल. वासोटा, नागेश्वर, चकदेव, पर्बत, आडोस-माडोस, मालदेव, डिचोली इत्यादी ठिकाणी फिरण्याची मजा काही निराळीच.
वासोटा किल्ल्यासारखे अवघड प्रदेश...कोयना, सोळशी, कांदाटी या नद्या आणि असंख्य ओढे...महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बाबूचा कडा...पाली, झुंगटी यांसारखी घनदाट जंगलं असलेली खोरी...अनवट वाटा...एका बाजूला सह्याद्रीचा नैसर्गिक कडा आणि दुसऱ्या बाजूला शिवसागराचा विस्तीर्ण जलाशय...जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा प्रचंड पाऊस...मन मोहून टाकणारं जंगलाचं सौंदर्य...दरी भरून-भारून टाकणाऱ्या बिबट्यांच्या किंवा वाघांच्या डरकाळ्या आणि जंगलात ठायी ठायी दिसणारी विविधता
कसे जाल? : पुणे/मुंबई-उंब्रज-कोयनानगर-कोयना
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, खवले मांजर, शेकरू, वानर, गवा, रानकुत्रा, बिबट्या, वाघ इत्यादी.
अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाई :
खरंतर कोयना हा पाटण शहरातील छोटासा भाग. मात्र, पाटण शहराची ओळखच कोयना
परिसरामुळे झाली. अशा लॅन्डमार्क असणाऱ्या कोयनेची ख्याती महाराष्ट्रच
नाही, तर संपूर्ण देशभर पसरलेली आहे. महाराष्ट्रची भाग्यलक्ष्मी, आशिया
खंडातील एकमेव भूमिगत धरण, अथांग पसरलेला शिवसागर जलाशय, प्रचंड मोठे
विद्युत प्रकल्प, १९७६ सालचा मोठा भूकंप, कोयना अभयारण्य आणि इथली मंदिरं,
विविध स्थळांमुळे कोयना परिचित आहे. मात्र, एवढीच ओळख कोयनेची नाही. तिच्या
पोटात अनेक प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहे. त्यामध्ये ओझर्डे धबधबा,
सुंदरगड, भैरवगड, रामबाण तीर्थक्षेत्र, प्रसिद्ध येराड देवस्थान,
रूद्रेश्वर मंदीर, चाफळचं राम मंदिर, प्रति औदुंबर, पाटणकरवाड्यातील राम
मंदिर, ग्रामदैवत लक्ष्मीदेवीचे मंदिर, नेहरु उद्यान, तारळी धरण, काठीटेक
डोंगर, १४ वरगळी, वाल्मीक पठार, उलटा धबधबा, तारळे गावजत्रा, सडा
वाघापूर-वनकुसावडे पवनचक्की प्रकल्प, मारूल नंदादीप उत्सव अशा वेगवेगळ्या
ठिकाणांनी आणि धार्मिक परंपरांनी कोयना समृद्ध आहे.
ओझर्डे धबधबा
पावसाळ्यात
कोयना पर्यटन म्हटलं की, पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो सुमारे ३५०
मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा. पावसाळ्यात कोयनानगरचा परिसर
हिरवीगार शाल पांघरू लागला आहे. कोयनेतून केवळ १० किलोमीटरचे अंतर कापत
असताना गर्द हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष, वळणावळणाचे रस्ते, शेजारीच
पसरलेला शिवसागर जलाशय, जमिनीपर्यंत टेकलेल्या छपरांची घरे, भर पावसात
शेतामध्ये भाताच्या रोपांची लागण करणाऱ्या महिलांचा समूह, बाजूलाच वाहणारी
मातीच्या रंगाची कोयना नदी, छोटीछोटी दुकाने पाहत-पाहत आपण ओझर्डे
धबधब्याशेजारी पोहोचतो. कोयनेतील पर्यटकांचे खास आकर्षण असणारा म्हणजेच
ओझर्डे धबधबा. निसर्गरम्य परिसर आणि धबधब्याच्या पाण्यात ओलेचिंब होण्याचा
आनंद वेगळाच अनुभव देणारा आहे.
दमदार
आणि संततधार पावसाने निसर्ग या धबधब्याला पुन्हा जिवंत करतो. पाबळनाला
धबधबा पाहिल्यानंतर थेट ओझर्डे धबधब्याकडे आपण प्रवास करतो. मुख्य
प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोठमोठ्या दगडी शिळा पाण्याच्या तडाख्याने
गुळगुळीत झालेल्या निदर्शनास येतात. तसेच प्रवेशद्वारापासून कोसळणारा अन्
फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर पर्यटक वेगाने पायऱ्या चढायला लागतो.
जंगलातून
चढ चढत असताना एका बाजूला फेसाळणारं पाणी, त्याचा विशिष्ठ आवाज, झाडांच्या
खोडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि त्यावर आलेली हिरवीगार शेवाळे,
जाडजूड वेली, मध्येच लोखंडी कड्ड्यावर चिंब भिजल्यामुळे कुडकुडत असणारा
माकडांचा समूह, मोठ्या धबधब्याला येऊन मिळणारे छोटेछोटे झरे, पारदर्शक
पाण्यातून दिसणारा गुळगुळीत खडक, झाडांच्या पानांवरून ओघळणारे पावसाचे
थेंब, पाहत-पाहत जवळपास ४०० पायऱ्या चढून आपण कधी धबधब्याजवळ पोहोचलो
लक्षात येत नाही. जेव्हा विशालकाय धबधब्यातून जवळपास ९०० फूटावरून कोसळणारे
पाणी पाहिले की, निसर्ग अफलातून आहे, असं वाटायला लागतं. कारण, पाण्याचा
वेग, बाजूला पाऊस नसतानाही केवळ धबधब्याच्या पाण्याने उडणारे तुषार
पर्यटकांनी चिंब भिजवून टाकतात. पूर्ण परिसर पाण्याच्या तुषारांनी भरलेला
असतो. त्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोयनेला भेट देत असतात.
सुंदरगड (घेरादातेगड)
घेरादातेगड : जास्वंदी फुलाच्या आकारासारखे कान असलेला दुर्मीळ गणेशाची मूर्ती
पाटण
शहराच्या वायव्य दिशेला पाहिले की, प्रचंड मोठा गड आपल्या नजरेला पडतो.
त्यालाच घेरादातेगड म्हणतात. हा गड टोळेवाडी या गावामध्ये आहे. या गडाला
सुंदरगड किंवा दंतगिरी असेही म्हंटलं जातं. विशेष म्हणजे किल्ल्यावर सहजपणे
आपण दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ शकतो. किल्ल्याच्या पायथ्यालाच
ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदीर आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार
आहे. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपामध्ये हे प्रवेशद्वार कोसळले असल्याची
माहिती स्थानिक लोक देतात. त्याठिकाणी जाण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात
खोदलेल्या सुमारे ३० पायऱ्या आहेत. त्या उतरल्यानंतर समोरच ६ फूट उंचीची
जास्वंदीच्या फुलासारखे कान असलेली लाल रंगाची गणेशाची मूर्ती आहे.
त्याच्या शेजारीच सुमारे १० फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शेकडो वर्षे
झाली. मात्र, आजही या मूर्तींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही.
सर्वात
महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर सुमारे १०० मीटर लांब आणि २०० फूट
खोल तलवारीच्या आकाराची विहिर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी अंदाजे ५०
पायऱ्या आहेत. विहिरीत उतरून वरच्या बाजूला पाहिले की, विहिरीचा
तलवारीसारखा आकार पर्यटकांच्या लक्षात येतो. काही पायऱ्या उतरल्यानंतर
डाव्या बाजूला एक गुहा आहे. त्यात महादेवाची पिंड आणि भग्न झालेला दगडी
नंदी आहे. तसेच इतक्या उंच ठिकाणी उन्हाळ्यातदेखील या विहिरीला पाणी
असल्याचे दिसून येते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर आणि टाकी यावरून हा
किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. इतिहास असं सांगतो की,
गडावर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली कचेरी व कायमची शिबंदी होती. या
शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे
हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता.
भैरवगड
घेरादातेगड : जांभा दगडात कोरलेली पूर्वला तोंड असलेली हनुमानाची मूर्ती
सातारा-रत्नागिरीच्या
सीमारेषेवर कोयनानगरपासून २० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या
पर्वतमाथ्यावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात हा शिवकलीन भैरवगड आहे. हा भाग
वनविभागाच्या अंतर्गत येतो. येथे जाण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक
आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या समुहाला, तसेच चारचाकी असेल तरच ही परवानगी
असते. कारण, कोयना अभयारण्यातील प्राणी खास करून गवरेड्यांचा कळप कधीही
हल्ला करू शकतो. गडावर भैरवनाथाचे मंदीर आहे. तेथे छत्रपती शिवाजी
महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आहे. मुख्य गड कोकणच्या बाजूच्या समोरील
टेकडीवर आहे. गडावर जाण्यासाठी अवघड पायवाट चालत असताना ढासळलेल्या
बुरुजांचे अवशेष आपल्या नजरेला पडतात. या बुरुजांवरून समोरचा निसर्ग पाहून
व्यक्ती थक्क होतो. कारण, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा नैसर्गिक ठेवा
आश्चर्यचकीत करायला लावणारा आहे.
गडावर
टेहाळणी गुहा आहे. गुहेपर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. मात्र, गुहेत
जाता येत नाही. गडावर शिवकालीन पडक्या वाड्यांचे अवशेष दिसतात. गडाच्या
मार्गावर उभ्या कड्यात भुयारी पद्धत्तीने खोदलेले थंड पाण्याचे कुंड आहे.
खरेतर भैरवगडाकडे जायचे म्हटले की, पायी भ्रमंती करणे आनंददायक आहे.
हेळवाक, मेंढेघर, नाव, पाथरपुंज या गावांतून गडाकडे जाता येते. गडावरून
पाटण येथील गुणवंतगड, घेरादातेगड नजरेला पडतात. गडाच्या पायथ्याशी कोकणमधील
चिपळूण तालुक्यातील पात्रे, मजूत्तरी, रातअंबे, तळावडे, बल्लारमाच,
धगरवाडा, गोऊळ गावे दिसून येतात.
सडावाघापूर आणि वनकुसवडे
पाटण
तालुक्यात दोन महत्त्वाचे आणि आशिया खंडात प्रसिद्ध असणारे वीज प्रकल्प
आहेत. एक आहे कोयनेचा भूमिगत वीज प्रकल्प आणि दुसरा आहे वनकुसवडेचा
पवनऊर्जा प्रकल्प. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पश्चिम-उत्तर
सह्याद्री पर्वताच्या वनकुसवडे पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प
उभारला आहे. त्याचबरोबर सडावाघापूर येथेही पवनचक्कीचे जाळे मोठ्या प्रमाणात
विणले आहे. पवनचक्कीचे भलेमोठे फिरणारे पाते जवळून पाहताना काळजात धस्स
होते. १ हजार एकरमध्ये दोन हजार पवनचक्कीची पाती १२५० कि.वॅटच्या क्षमतेने
वाऱ्याच्या जोरावर फिरतात. यापासून १००० मेगावॅट विजनिर्मिती होत आहे.
पठारावर उंच पण, जमिनीला टेकतील अशा छपरांची घरे आपल्याला पाहयला मिळतात.
पवनउर्जा प्रकल्प : सडावाघापूर आणि वनकुसावडे या डोगंरांवर मोठमोठे पवनउर्जा प्रकल्प उभारलेले आहेत.
दुरून
ही घरे छोटी आणि खुजी दिसत असली तरी एखाद्याा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर
घराचा आवाका आतून खूप मोठा असल्याचे लक्षात येते. घरामध्ये सुमारे १०
जनावरे बांधली जातील इतका मोठा गोठा, त्याच्या सहा-सात खोल्या असतात. तसेच
धान्य ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची जमिनीमध्ये जागा तयार केलेली असते.
पवनऊर्जा प्रकल्पामुळे या गावांमध्ये हळूहळू विकास होत आहे. या दोन्ही
डोंगरावरून समोर पाहिले असता पाटण शहराचे विहंगम चित्र डोळ्यांसमोर दिसते.
वळणवळणाचे मार्ग कापत वाहत जाणाऱ्या केरा आणि कोयना या नद्या, तसेच त्यांचा
संगम, चोहो बाजूंनी पसरलेला सह्याद्री, अवघड असणारा घाटरस्ता, वेगाने
वाहणारे वारे, परिसरात पसलेली लाल माती, छोटीछोटी काटेरी करवंदांची झाडे,
प्रचंड मोठी दरी, दरीमध्ये वसलेली गावे आदी ठिकाणं डोळ्यांना सुखावून
जाणारी आहेत. पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याचा
आनंद वेगळाच आहे. पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी जेव्हा दरीमध्ये
कोसळण्यासाठी येते. तेव्हा वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे ते पाणी दरीत न
जात वाऱ्यामुळे उलट्या दिशेने उडत राहते. त्यामुळे त्याला उलटे धबधबे
म्हणतात. असे धबधबे पाहण्यासाठी, त्यामध्ये भिजण्यासाठी पर्यटक हमखास
येतात.
श्री क्षेत्र येडोबा (येराड)
येराड मंदीर : महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेलं देवस्थान कोयना नदीच्या किनारी पाहायला मिळतं.
पाटण
शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर (कराड-चिपळूण रोडवर) येराड हे छोटेसे
गाव आहे. डाव्या बाजूला संथ वाहणारी कोयना नदी आणि उजव्या बाजूला उंचचउंच
सह्याद्रीच्या डोंगररांगा, यामधून प्रवास करत आपण या गावामध्ये प्रवेश
करतो. १३ एकर परिसरात हे मंदिर
उभारलं आहे. या ठिकाणाला ‘बनपेठ’ नावानेदेखील ओळखलं जातं. मंदिराच्या
सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर दगडी नंदी आणि कासव मूर्ती आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन दगडी मूर्ती आहेत, त्यांना ‘रडवे’
म्हणतात. रडवेच्या पाठीमागील कथा अशी की, श्री येडोबा आणि देवी जोगेश्वरी
यांच्या विवाहावेळी दोन भाऊ उपस्थित होते. मात्र, ते मानपमानासाठी हे दोघे
भाऊ रुसून बसले होते. त्याचे प्रतीक म्हणजे हे रडवे आहेत.
गाभाऱ्याच्या
मध्यभागी येडोबा दैवत ठाण मांडून बसलेले आहेत. उजव्या बाजूला देवी
जानुबाईची मूर्ती असून डाव्या बाजूस येडोबा देवाचे रक्षक उभे आहेत.
सभामंडपाच्या डाव्या बाजूस उत्तराभिमुख शिवलिंग आहे. तसेच मंदिराच्या
उत्तरेस देवी जोगेश्वरीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पुरातन काळातील अनेक
दगडी मूर्ती आहेत. येराडची यात्रा खूप प्रसिद्ध आहे. यात्रेला महाराष्ट्र
आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. विशेष म्हणजे
यात्रेतील ‘रिंगवण’ हा विधी खूप प्रसिद्ध आहे. हा विधी रात्री १२ वाजता
संपन्न होतो.
पाबळनाला धबधबा : कोयना परिसरात असे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात
यामध्ये
थोरवे घराण्यातील मानकरी नैवेद्याची तयारी करतात. नैवेद्य दाखविताना
मंदिराचे दरवाजे आणि दारे, खिडक्या बंद केल्या जातात. त्याचबरोबर संपूर्ण
गावातील दिवेदेखील बंद केले जातात. रिंगवनचे पाच मानकरी एकत्र येतात.
त्यांच्यापुढे दिवटीवाला असतो. सर्वांची बसकन जमिनीवर असते आणि त्यांच्या
सभोवती पडद्यांचे आवरण उभे केले जाते. गर्द काळ्या अंधारात मध्यरात्री १२
वाजता ५ मानकरी पडद्यांच्या आवरणासह चित्रविचित्र भयानक आवाज काढत मंदिराची
प्रदक्षिणा मानकरी पूर्ण करतात. त्यावेळी सव्वा पायलीचा भात आणि नैवेद्य
विस्कटून मंदिराच्या चोहोबाजूला टाकला जातो. नंतर नैवेद्यातील एकही शित
जमिनीवर सापडत नाही, अशी प्रथा राज्यभर प्रसिद्ध आहे. बाजूला वाहणारी संथ
नदी, भव्य मंदिर, गावातील छोटीछोटी घरे, मोठमोठी फणस-आंब्याची झाडे,
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची आणि भाताची शेती, अशा निसर्गाच्या
सानिध्यात हे येडोबा देवाचे दर्शन घेणे मोठी पर्वणीच म्हणावी लागेल.
धारेश्वर दिवशी
मुख्य
शहरापासून उत्तर दिशेला १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धारेश्वर दिवशीमध्ये
निसर्गाची अद्भूत किमया पाहायला मिळते. डोंगरांमधून प्रवास करताना
पावसामध्ये नजरेला पडणारे दृश्य मनमोहक असते. कारण, येथे वाफ्यामध्ये केली
जाणारी भातशेती, हिरव्यागार डोंगरांमध्ये निवांतपणे चरणारी जनावरे, त्यांची
राखण करण्यासाठी आलेल्या ग्रामीण महिला, गावरान भाषेत बोलत नव्या
पाहुण्यांशी आपुलकीने संवाद साधणारे गावकरी, बाजूलाच असणारी मोठी दरी आणि
डोंगरावर उतरलेले ढग अशा नयनरम्य वातावरणात आपण धारेश्वर दिवशीच्या
देवस्थानाकडे प्रवास करत असतो.
धारेश्वर दिवशी : प्रचंड मोठ्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या गुहेत शिवलिंगं आहेत आणि डोंगरावरून मोठमोठं धबधबे मंदिरासमोर कोसळतात
जेव्हा
आपण मंदिराच्या परिसरात येतो तेव्हा पर्यटक आवक् होतो. कारण, प्रचंड मोठा
डोंगर अन् त्या डोंगराच्या पोटात खोदलेलं हे मंदिर पाहून आश्चर्य
वाटल्याशिवाय राहत नाही. पावसामध्ये डोंगरावरून कोसळणार्या धारा गुहेतून
पाहताना भक्त समाधानी होतो. या गुहेचे वैशिष्ट्य असे की, कोठेही खांब, भिंत
नाही. तरीही ही गुहा शेकडो वर्षे टिकून आहे. परिसरात प्रवेश करताच ३
शिवलिंग नजरेला पडतात. असे सांगितले जाते की, रावणाने आपल्या पापक्षालनार्थ
९ कोटी लिंगे स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्यातील या तीन पिंडी
आहेत. त्याचे पूजन केल्याने पितृदोष नाहीसा होतो. तेथील
नवदुर्गांचे पूजन केल्यास घरातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर डोंगरावरून
पडणाऱ्या धबधब्यात अंघोळ केल्यास त्वचेचे विकार नाहीसे होतात, असे सांगितले
जाते.
गंगोत्री,
जमनोत्री नावाचे दोन कुंड आहेत. देवस्थानतर्फे आजही ३५ गायी सांभाळल्या
जातात. त्याचबरोबर देवस्थानची कामे किंवा गायीला चारा आणून देण्याचा मान
शेजारच्या गावकऱ्यांना आहे. कोणताही मोबदला न घेतात संपूर्ण गाव या
देवस्थानच्या कामासाठी एकत्र येते. ज्ञानेश्वरीमध्ये धारेश्वर दिवशीचा
उल्लेख सापडतो, त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक क्षेत्रात महत्त्व प्राप्त
झाले आहे. तसेच असेही सांगितले जाते की, राम आणि पांडव यांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर १२ वर्षांनी त्रंबकेश्वर
नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी धारेश्वर धबधबा शिवशंभु महादेवाच्या पिंडीवरून
भागीरथी दूधगंगा प्राप्त होते. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक
येतात. येथील यात्रा दिवाळीत असते. या यात्रेत काठेपालखी मिरवणूक ही
वैशिष्ट्य मानले जाते. काठेपालखीवर लोखंडी टोकदार सळ्यांच्या काठावर
मानकऱ्यांना झोपवून त्यांची मंदिर परिसरातून मिरवणूक काढली जाते.
श्रीराम मंदिर (चाफळ आणि पाटणकरवाडा)
चाफळ : चापळच्या प्रसिद्ध राम मंदिराकडे जाताना घाटातून जाताना वाटेतच डोंगरामध्ये हा फेसाळणारे धबधबा आहे.
पाटण
शहाराच्या मध्यभागात सरदार नागोजीराव पाटणकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे. या
वाड्याला चारी बाजूंनी बुरूज आहेत. याला पाटणकर वाडा असेही संबोधले जाते.
यामध्ये ऐतिहासिक राम मंदिर आहे. यापाठीमागे अशी कथा सांगितली जाते की,
समर्थ रामदास स्वामी चाफळला एकटेच निघाले होते. वाटेत कोयना नदीला पूर आला.
स्वामींनी चांदजीराव पाटणकर यांनी बोलवले होते. मात्र, त्यांना उशीर झाला
म्हणून त्यांनी नदीतून पोहत येण्याचा विचार केला अन् नदीमध्ये उडी घेतली.
मात्र, नदीमध्ये चक्राकृती भोवऱ्यात ते अडकले आणि भोवऱ्यासरशी स्वामी
नदीच्या तळात गेले. पाटणकर आणि इतर मंडळींना वाटले की स्वामी नदीत बुडाले.
त्यांनी खात्री करून घेतली आणि घरी निघून गेले.
स्वामी
बुडून तीन दिवस झाले होते. मात्र, चाफळला निरोप मिळल्यानंतर कल्याण गोसावी
आणि उद्घव गोसावी यांनी पाटणला भेट दिली. स्वामी बुडाले ते ठिकाणी पाहिले.
तरीही कल्याण गोसावी यांनी नदीत उडी घेतली आणि नदीच्या तळात गेले. तर,
तेथे स्वामी समर्थ पद्मासन घालून बसले होते. गोसावी यांनी स्वामींना
नदीबाहेर आणले. तीन दिवसांनंतर पाण्यात राहून स्वामी परतल्याने सर्वांना
आश्चर्याचा धक्का बसला. चांदजीराव पाटणकर आणि इतर मंडळींना स्वामींना
साष्टांग दंडवत घातला. त्यावेळी स्वामींनी पाटणकर यांना श्री
पट्टाभिरामचंद्राची पंचरसी धातूची मूर्ती दिली. या मूर्तीची पाटणकर
वाड्यामध्ये आजही नित्यनियमाने सकाळी आणि सायंकाळी पूजा केली जाते.
छोटेसे
टुमदार चाफळ हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कारण, श्री रामदास
स्वामींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. समर्थ रामदास यांच्या
आयुष्याच्या उत्तरार्धातील सर्वात जास्त वर्षे त्यांनी चाफळमध्ये वास्तव्य
केले हाेते. त्यामुळे या ठिकाणाला वेगळे महत्त्व आहे. १६४९ साली समर्थांनी
श्रीराम मंदिराची स्थापना केली आहे. त्याची
अशी कथा आहे की, समर्थांना कोरेगाव (ता. अंगापूर) येथे श्रीराम मूर्ती
असल्याचा साक्षात्कार झाला. ते कोरेगावला गेले. कृष्णा नदीच्या डोहातून
त्यांनी मूर्ती बाहेर काढली आणि सरळ चाफळला निघाले. मात्र, तेथील
ग्रामस्थांनी त्यांनी अडविले आणि मूर्ती याच गावात स्थापन करा, असा हट्ट
धरला. त्यामुळे समर्थांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र,
ग्रामस्थांनी ऐकले नाही. शेवटी समर्थांनी मूर्ती रस्त्यातच ठेवून निघून
गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी ती मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला. शर्थीचे
प्रयत्न करूनही मूर्ती एक इंचही जागेवरुन हलली नाही. ग्रामस्थांना आपली चूक
लक्षात आली. त्यांनी समर्थांची माफी मागितली. नंतर समर्थांनी चाफळ येथे
१६४९ साली श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि त्या कोरेगावच्या
ग्रामस्थांना श्रीराम जन्मोत्सोवात निशाणा धरण्याचा मान दिला. १६४९ पासून
आजपर्यंत नियमितपणे जन्मोत्सोवस साजरा केला जातो. त्याचबरोबर समर्थांनी ११
क्षेत्रांमध्ये ११ मारूतींची स्थापना केली आहे. तसेच त्यामधील दासमारूती हा
श्रीराम मूर्तीसमोर आणि श्रीराम मूर्तीच्या पाठीमागे २०० मीटर अंतरावर वीर
मारुती आहे. अत्यंत निसर्गरम्य पावसाळी वातावरणात मंदिराला भेट देणं
वेगळाच अनुभव गाठीला बांधण्यासारखा आहे.
नंदादीप उत्सव
याशिवाय
कोयनेच्या परिसरातील मारुल हवेली या गावामध्ये ‘नंदादीप उत्सव’ साजरा केला
जातो. हा उत्सव श्रावण महिन्यात असतो. संपूर्ण महिनाभर महादेवाच्या
मंदिरात हजारो समई रात्र-दिवस तेवत ठेवल्या जातात. हा उत्सव पाहण्यासाठी
हजारो नागरिक या मंदिराला भेट देतात. भारसाखळे येथे ११ एकर परिसरात
पसरलेल्या विस्तीर्ण जंगलाच्या मधोमध शंभू महादेवाचे मंदिर आहे. याचे
वैशिष्ट्य म्हणजे दाट जंगलातूनही मंदिराच्या कळसावर सूर्यकिरणे पडतात. ते
पाहण्यासाठी पर्यटक येतात.
राम मंदीर : पाटण शहरात पाटणकर सरदारांना मोठा वाडा आहे. त्यामध्ये रामदास स्वामी स्थापित हे राम मंदिर आहे.
पाटण
तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाटणमध्ये गुरेघर, तारळी, निवकणे, बिबी,
उत्तरमांड अशी पाच धरणे आहे. या धरणांच्या ठिकाणी फिरण्यासाठीही लोक
सुट्टीमध्ये जात असतात. तसेच येराडवाडी येथे सुमारे ३०० पायऱ्या चढून
डोंगराच्या पोटात रुद्रेश्वराची गुहा आहे. गुहेमध्ये अनेक छोटेछोटे दगडाचे
खांब तयार केले आहेत. तसेच डोंगरातून कोसळणारा धबधबा आणि धबधब्याच्या आतील
बाजूला महादेवाचे शिवलिंग आहे. गुहेतून धबधबा पाहण्यासाठी लोक या ठिकाणाला
आवर्जुन भेट देतात. आपणही या निसर्गाने नटलेल्या कोयना परिसरातील ठिकाणांना
नक्की भेट द्या. कारण, निसर्ग आपल्याला साद घालतोय.
कसे याल?
१) पुण्यावरुन यायचे असल्यास, पुणे-सातारा- उंब्रज- पाट्णमार्गे १८२ कि.मी.
२) मुंबई-चिपळूण-कोयनानगर 288 KM
पुणे-मुंबईवरुन कोयनानगरला जर पुणे-बेंगळूरु महामार्गाने येत असाल, तर वाटेत थांबण्यासारखी ठिकाणे
१) जोशी वाडेवाले (एनएच 4) -> कात्रज बोगला पार केल्यावरआपल्या उजव्या बाजूला दिसते. वडापाव, मिसळपाव, चहा / कॉफी, वडा सांबार इत्यादी चवदार खाद्यपदार्थ.
२) हॉटेल नटराज (एनएच 4)) -> खेड शिवापूरजवळ (सातार्याकडे जाताना डावीकडे). दक्षिण भारतीय नाश्त्यासाठी चांगली जागा. उडपी व्यवस्थापन.
३) विठ्ठल कामथ रेस्टॉरंट (एनएच 4)) - शिरवळच्या आधी किकवी गावात आपल्या डावीकडे “कंपनी ऑपरेट एचपी पेट्रोल पंप” च्या आवारात. चांगले अन्न, भरपूर जागा आणि स्वच्छ शौचालये. आपल्याला फक्त शुद्ध व्हेज मिळेल. दक्षिण भारतीय / पंजाबी / चीनी खाद्य. पेट्रोलही पुणे शहरापेक्षा स्वस्त.
४) माईलस्टोन फूड प्लाझा (एनएच 4) - सातारा आणि उंब्रज दरम्यान (सातारा / कराडच्या दिशेने जाताना डावीकडे). हे पुणे - नगर रोडवरील स्माईलस्टोन फूड प्लाझासारखेच आहे.
२) गोवा महामार्गावर तुम्हाला विठ्ठल कामथ रेस्टॉरंट प्रत्येक 100 किमी नंतर दिसेल.
कोयनानगर मधील पर्यटन स्थळ.......
१. कोयना धरण
२. नेहरू उद्यान
३. ओझरडे धबधबा
४. जंगली जयगड
५. पॅगोडा, हुंबरळी
६. प.पु. गगनगिरी महाराज आश्रम, ढाणकल
७. विट्ठल रुक्मिणी मंदिर, नवजा
८. राम घळ
९. बोटिंग (जलाशयातिल नौकाविहार)
१०. घाटमाथा
११. भैरवगड
१२. वासोटा किल्ला
कोयनानगर परिसराच्या पर्यटन स्थळांचा नकाशा
कोयना धरणाविषयी महत्त्वाचे
निसर्गसौंदर्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोयना नदीचे उगमस्थान महाबळेश्वरपासून ६४ किलोमीटर अंतरावर कोयानानदीवर देशमुखवाडी येथे कोयना धरण बांधण्यात आले. सन १९१० ते १९१५ या काळात ब्रिटीश सरकारची संकल्पना असलेले कोयना धरण स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली १९६२ साली पूर्णत्वास आले . याच कोयना धरणातील अफाट जलसाठ्यावर चार टप्प्यात भव्य वीजनिर्मिती साकारून २००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली.
महाराष्ट्रातील “कोयना धरण” हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्वर येथुन उगम पावणाऱ्या कोयना नदीवर सन १९५४ ते १९६४ या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे. धरणातून होणाऱ्या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला “महाराष्ट्राची भाग्यरेषा” असे म्हटले जाते.
“केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ” (Central Board Of Irrigation And Power ) या संस्थेने सन २०१८ सालचा “उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा” देशपातळीवरचा पुरस्कार दि. १४ डिसेंबर २०१८ रोजी कोयना धरणास जाहीर केला आहे. या संस्थेमार्फत १९२७ पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना / संस्थांना गौरविण्यात येत आहे.
कोयना धरणाची लांबी ८०७ मीटर असून उंची १०३ मीटर आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता २९८१ दलघमी (१०५ टीएमसी) एवढी आहे. या धरणामुळे ८९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला “शिवाजीसागर” या नावाने ओळखले जाते. धरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी ६ वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे.
दि. १० डिसेंवर १९६७ रोजी कोयनानगर येथे ६.३ रिक्टर क्षमतेचा भुकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते. तेव्हापासून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर “जलाशय प्रेरित भूकंप” (Reservoir Induced Seismicity) वर संशोधनास सुरुवात झाली आहे. सन १९६८ मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन १९७३ मध्ये या धरणाचा अपरिवाह (non-overflow) भागाचे तर सन २००६ मध्ये परिवाह (overflow) भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे. धरणाचे बांधकाम होऊन आता ५५ वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील ५० वर्ष झाले आहेत. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या ५० वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने (Best Maintained functional Project for more than 50 years) देण्यात आला आहे.
या धरणाचा इतिहास शोधला असता, असे आढळून येते की, १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती. १९१८ नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर १९२८ च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला. १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन १९५१ मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला. सन १९५३ मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन १९५४ मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते. या तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसऱ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यासाठी दोन वेळा (सन २००२ मध्ये व सन २०१५ मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व दोन्ही लेक टॅप यशस्वी झाले आहेत.
हि वीज महाराष्ट्रासह शेजारील राज्यात वापरली जाते. त्याचबरोबर कोयना धरणातील पाण्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यातील शेतजमीन सिंचनाखाली आणून शेती सुजलाम-सुफलाम करण्यात आली आहे. म्हणूनच कोयना धरणाला महाराष्ट्राचे भूषण व भाग्यलक्ष्मी संबोधले जाते.
कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प १९६२ मध्ये पूर्णत्वास आला. १०५ टीएमसी पाणीसाठा क्षमता व १९२० मेगावॅट वीजनिर्मितीबरोबर सिंचनाची जबाबदारी आहे. कोयना नदीवर कोयनानगर येथे हे धरण उभारलेले आहे. त्या भागातील सरासरी वार्षिक पाऊस ५,००० मिलिमीटरचा आहे. धरणाची लांबी ८०७.७२ मीटर आहे. उंची १०३.०२ मीटर आहे. त्याचे बांधकाम १९५४ ते १९६७ या कालावधीत झाले आहे. सुमारे हजारो हेक्टरचे क्षेत्र ओलिताखाली आहे. कोयनेच्या जलाशयाला शिवसागर जलाशय नावाने संबोधले जाते. कोयनानगर ही कोयना धरणाच्या कामासाठी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांना राहण्यासाठी तयार झालेली एक वसाहत आहे.
नेहरू उद्यानाबद्दल थोड........
कोयना धरणाच्या भूमी पुजनासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ज्या भूमीला पाय लागले त्याचीच आठवण जपण्यासाठी कोयनानगर येथे भव्य नेहरू उद्यान उभारण्यात आले आहे. कोयनानगर पासून साधारण ३ कि. मी. च्या अंतरावर नवजाच्या दिशेला हे उद्यान बनविण्यात आले आहे. यामध्ये पंडितजींच्या पंचतत्वांची जाणीव करून देणारा पंचधारा घुमट देखील आहे. या उद्यानात विविध प्रकारची झाडे, वेली आणि मनमोहक फुले पर्यटकांच आकर्षण आहेत.लहान मुलाना खेळण्याकारिता येथे अद्यावत खेळणी देखिल आहेत, ज्यावर दिवसभर मुले रमून जातात. या उद्यानातुन कोयना धरणाची मागची बाजु पहावयास मिळते. नेहरू उद्यानात कोयना धरण, कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाची माहिती देणारी एक छानशी चित्रफीत सुद्धा दाखवन्यात येते त्यासाठी यशोगाथा केंद्र बनवलेले आहे. दरवर्षी बाल जयंतीच्या निमित्ताने येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहन्यात येते.
अलिकडेच या उद्यानाजवळ एका नवीन आकर्षणाची भर पडली आहे.उद्यानाच्या शेजारी असणार्या डोंगरामध्ये शिल्पमुद्रा तयार झाली असून ती पंडित नेहरू यांच्या चेहर्याशी मिळती जुळती आहे
नेमका नेहरु उद्यानाजवळच निसर्गाचाही हा चमत्कार दिसावा हे सर्वांसाठी आश्चर्य व उत्सुकतेचा विषय ठरला आहे. आजवर कोयनेला धरण, वीज निर्मिती प्रकल्प, नेहरू गार्डन, पॅगोडा, पावसाळ्यातील ओझर्डेसह अन्य धबधबे यामुळे पर्यटक येत असतात. आता डोंगरातील शिल्प मुद्रा हे येथील नवे आकर्षण आहे.
ओझर्डे धबधबा
पावसाळ्यात कोयना पर्यटन म्हटलं की, पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो सुमारे ३५० मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा. खरेतर सध्या सह््याद्रीच्या कुशीत वसलेला कोयनानगरचा परिसर हिरवीगार शाल पांघरू लागला आहे. कोयनेतून केवळ १० किलोमीटरचे अंतर कापत असताना गर्द हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष, वळणावळणाचे रस्ते, शेजारीज पसरलेला शिवसागर जलाशय, जमिनीपर्यंत टेकलेल्या छपरांची घरे, भर पावसात शेतामध्ये भाताच्या रोपांची लागण करत असणाºया महिलांचा समूह, बाजूलाच वाहणारी मातीच्या रंगाची कोयना नदी, छोटीछोटी दुकाने पाहत-पाहत आपण ओझर्डे धबधब्याशेजारी पोहोचतो. पाबळनाला धबधबा पाहिल्यानंतर थेट ओझर्डे धबधब्याकडे आपण प्रवास करतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोठमोठ्या दगडी शिळा पाण्याच्या तडाख्याने गुळगुळीत झालेल्या निदर्शनास येतात. तसेच प्रवेशद्वारापासून कोसळणारा अन् फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर पर्यटक वेगाने पायºया चढायला लागतो. जंगलातून चढ चढत असताना एका बाजूला फेसाळणारे पाणी, त्याचा विशिष्ठ आवाज, झाडांच्या खोडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि त्यावर आलेली हिरवीगार शेवाळे, जाडजूड वेली, मध्येच लोखंडी कड्ड्यावर चिंब भिजल्यामुळे कुडकुडत असणारा माकडांच्या समूह, मोठ्या धबधब्याला येऊन मिळणारे छोटेछोटे झरे, त्यातून पारदर्शक पाण्यातून दिसणारा गुळगुळीत खडक, झाडांच्या पानांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, पाहत-पाहत जवळपास ४०० पायºया चढून आपण कधी धबधब्याजवळ पोहोचलो लक्षात येत नाही. जेव्हा विशालकाय धबधब्यातून जवळपास ९०० फूटावरून कोसळणारे पाणी पाहताच वाटायला लागते की, निसर्ग अफलातून आहे. कारण, पाण्याचा वेग, बाजूला पाऊस नसतानाही केवळ धबधब्याच्या पाण्याने उडणारे तुषार पर्यटकांनी चिंब भिजवून टाकतात. पूर्ण परिसर पाण्याच्या तुषारांनी भरलेला असतो. अर्थात ईथे येताना थोडी काळजी घेतली पाहीजे. पाण्याचा जोर असेल तेव्हा थेट प्रवाहात न उतरणे, पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात जळवा असतात, तेव्हा जवळ आगपेटी बाळगून जळवा लागल्या तर चटका देता येईल किंवा हळद हा देखील उपाय आहे. शिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात सरिसृप आहेत, याचेसुध्दा भान ठेवायला हवे. या धबधब्याच्या पाण्याचा सुध्दा वीज निर्मिताला उपयोग करुन पाचवा टप्पा निर्माण करणे, प्रस्तावित आहे.
नवे महाबळेश्वर :-
कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.
कुंभार्ली घाट
कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे.
जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.
घाटमाथा येथील हॉटेल सुस्वाद
प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.
चांदोली व कोयना अभयारण्य:-
जागतिक नैसर्गिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या क्षेत्राला सर्वांगसुंदर निसर्ग लाभला आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदिर, जंगली भ्रमंती वाटा या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत आहेत. पर्यटकांसह निसर्गप्रेमींसाठी व्याघ्र प्रकल्पातील सुविधा त्या भागातील नैसर्गिक सुविधांचा आनंद लुटण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री म्हणजे पर्वतरांगांचा प्रदेश. तेथेच कोयना राष्ट्रीय व चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दोन्हीमध्ये सह्यादी व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्यादी व्याघ्र प्रकल्प अशी रचना झाली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा या भागात ओघ वाढला आहे. चांदोली आणि कोयनाचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे अधिक संरक्षित आहे. सह्याद्री म्हणजे विदर्भाबाहेरील मान्यता मिळालेला राज्यातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट, ताडोबा, अंधारी-पेंच प्रकल्पांनंतरचा सह्याद्री चौथा प्रकल्प आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे ७५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होतो आहे. या भागातील वाघांची संख्या लक्षात घेऊन तेथे व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यासाठी शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरालाही सामावून घेतले आहे. वाघांबरोबरच तेथे असणाऱ्या गवा, चितळ, सांबर व हरिण प्राण्यांनाही संरक्षण मिळाले आहे. २००७ च्या वन्यप्राण्यांच्या गणनेत कोल्हापूर विभागातील कोयनेत दोन, चांदोलीत तीन, तर राधानगरी परिसरात चार असे एकूण नऊ वाघ आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या चाळीसवर होती, ती आता वाढत जाऊन ७५ पर्यंत पोचल्याची नोंद आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. त्यामुळे येथे पर्यटनासही चांगला वाव मिळाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच निरोगी श्वासही मिळतो. व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे व्याघ्र प्रकल्पाचे स्वरूप आहे. जंगलात जवळपास ४५०० प्रजातींच्या वनस्पती असल्याचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणलोट क्षेत्र आहेत. झरे, धबधबे आहेत. नद्यांचा उगम येथूनच आहे. नद्यांवर धरणाची निर्मिती याच भागात आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौरस किलोमीटर व कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौरस किलोमीटरचे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित आहे. वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरिण, बिबटे प्राणीही येथे आहेत. त्यातील अनेक प्राणी दिसतातही. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये दुर्मीळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. कोयना प्रकल्पासह आठ मध्यम पाटबंधारे प्रकल्प, आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनऊर्जा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटणच्या पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाबरोबरच पवनऊर्जा प्रकल्पाने पाटण तालुक्याला जगाच्या नकाशावर नेले. वनकुसवडे, सडावाघापूर व वाल्मीक पठारावर जेथे कुसळही उगवत नव्हते अशा जांभ्या पठारावर देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी कोट्यावधींची गुंतवणूक करून एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रकल्पाने दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे पोचले व ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळाली. त्याचाही पर्यटनासाठी विशेष उपयोग झाला आहे.
व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला आंबा म्हणजेच विशाळगड आहे. दोन्ही ऐतिहासिक किल्ल्यांच्या मधे साकारणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला निसर्गाची मोठी देणगीच मिळालेली आहे. त्याचा विचार करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्या भागाची जागतिक वारसास्थळ म्हणून घोषणा झाल्यामुळे या भागातील पर्यटन विकासाला गती आली. व्याघ्र प्रकल्पातील धबधब्यापासून किल्ल्यांवरील पर्यटनास चालना देणाऱ्या अनेक गोष्टी येथे विकसित होत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यासकांची गर्दी असते. पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेथे नेहमीच येतात. इतर वेळी मृतप्राय झालेली पठारे पावसाळ्यात जिवंत होतात, हेच भागाचे वैशिष्ट्य आहे. पवनचक्क्यांचा तालुका म्हणूनही परिसराची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्क्यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. तो भागही पर्यटनाच्या सुविधेत आणला गेला आहे. त्याशिवाय खासगी कंपन्यांकडूनही येथे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाणेल येथे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था खासगी संस्थेकडून केली आहे.
मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोयना शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्त्वाची दोन धरण आहेत. त्याच्या जलाशयात बोटिंगची सुविधा करणार आहेत. ते काम सुरत यंत्रणेच्या परवानगीनंतर सुरू होणार आहे.
डोंगरावरील मंदिरे : उत्तरेश्वर, पर्वत, चकदेव, नागेश्वर, उदगीर
धबधबे : ओझर्डे धबधबा, कंदार डोह
जंगल भ्रमंती वाटा : मेट इंदोली ते वासोटा, नवजा ते जंगली जयगड, कोठावळे ते भैरवनगड, पानेरी ते पांढरपाणी, झोळंबीचा सडा, खुंदलापूर ते झोळंबी, चांदोली ते धरण निवळे.
आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प
पाटण तालुका म्हंटल कि निसर्ग सौंदर्याचे नवे दालनच पर्यटकांना डोळ्यासमोर दिसू लागले आहे. अफाट पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा भव्य पवनऊर्जा प्रकल्प निसर्गाच्या उंच शिखरावर डोलाने आपली पाती फिरवत उभा आहे. कोणतेही पिक अथवा गवत न उगवणाऱ्या पठारावरील सरासरी १ हजार एकर जमिनीमध्ये २ हजार पवनचक्कीची पाती , १२५० कि.वॅट क्षमतेच्या वाऱ्याच्या जोरावर फिरत असून यापासून १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे . या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी सहभाग घेतला असून हजारो हेक्टर परिसरातील डोंगर कपारीत आदिवाशी जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. पवनऊर्जा कंपनीच्या माध्यमातून येथे दळणवळणाच्या सोयीसह येथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते. पाटणमधून सहज नजरेस पडणारा पवनऊर्जा प्रकल्प पाटणपासून काही अंतरावर आहे. एकदा या प्रकल्पाच्या सानिध्यात गेले कि पाचगणीच्या टेबललँडलाही मागे टाकणाऱ्या या वनकुसवडे पठारावरून सह्याद्री पर्वताच्या अफार पसरलेल्या पर्वतरांगांसह शिवसागर जलाशयाचा नजराना पर्यटकांच्या नजरेस येतो . तर पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय व सूर्यास्त पाहताना खरोखरच नवीन काही तरी पाहिल्याचा आनंद येथे जाणवतो .प्रदूषण मुक्त असणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पाने जागतिक पर्यावरणामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
सडावाघापूर आणि वनकुसवडे
पाटण तालुक्यातील दोन महत्त्वाचे आणि आशिया खंडात प्रसिद्ध असणारे विज प्रकल्प आहेत. एक आहे कोयनेचा भूमिगत विज प्रकल्प आणि दुसरा आहे वनकुसवडेचा पवनऊर्जा प्रकल्प. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पश्चिम-उत्तर सह््याद्री पर्वताच्या वनकुसवडे पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर सडावाघापूर येथेही पवनचक्कीचे जाळे मोठ्या प्रमाणाच विणले आहे. पवनचक्की भलेमोठे फिरणारे पाते जवळून पाहताना काळजात धस्स होते. १ हजार एकरमध्ये दोन हजार पवनचक्कीची पाती १२५० कि.वॅटच्या क्षमतेने वाºयाच्या जोरावर फिरतात. यापासून १००० मेगावॅट विजनिर्मिती होत आहे. पठारावर उंच पण, जमिनीला टेकतील अशा छपरांची घरे आपल्याला पाहयला मिळतात. दुरून ही घरे छोटी आणि खुजी दिसत असली तरी एखाद्याा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घराचा आवाका आतून खूप मोठा असल्याचे लक्षात येते. घरामध्ये सुमारे १० जनावरे बांधली जातील इतका मोठा गोठा, त्याच्या सहा-सात खोल्या असतात. तसेच धान्य ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची जमिनीमध्ये जागा तयार केलेली असते. पवनऊर्जा प्रकल्पामुळे या गावांमध्ये हळुहळु विकास होत आहे. या दोन्ही डोंगरावरून समोर पाहिले असता पाटण शहराचे विहंगम चित्र डोळ्यांसमोर दिसते. वळवळणाचे मार्ग कापत वाहत जाणाºया केरा व कोयना या नद्याा, तसेच त्यांचा संगम, चोहो बाजूंनी पसरलेला सह््याद्री, अवघड असणारा घाटरस्ता, वेगाने वाहणारे वारे, परिसरात पसलेली लाल माती, छोटीछोटी काटेरी करवंदांची झाडे, प्रचंड मोठी दरी, दरीमध्ये वसलेली गावे आदी ठिकाणी सुखावून जाणारी आहेत. पवनचक्कीच्या पात्याआड सुर्योय किंवा सुर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. तसेच पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी आणि डोंगरमाथ्यावर प्रचंड वेगात वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी उलटे धबधबे पाहायला मिळतात.
के.टू.पाँईट ( काठी अवसरी )
हिमालय पर्वतासारखे पसरलेले काठी अवसरी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगा , यामधून वाकडे-तिकडे साद घालणारे कोयना धरण , शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी , या पाण्यात सह्याद्री पर्वतावर हिरवेगार डोलणारे कोयना अभयारण्याचे प्रतिबिंब म्हणजे हिमालय पर्वतातील काश्मिरच होय. काठी अवसरी के.टू. पाँईटकडे जाताना सह्याद्री पर्वतावर पसरलेला आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्पाच्या पंख्यांचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष घोंगावणारा वारा येथे अनुभवता येतो .
के.टू. पाँईटवरून शिवसागर जालाशयाबरोबर दिसणारा हिरव्यागार घनदाट जंगलातील निसर्गरम्य परिसरातील डोंगरामागे सायंकाळच्या वेळेला लपणारा सूर्य पाहताना स्वर्गाहूनही सुंदर हि भूमी वाटल्याशिवाय राहणार नाही. या के.टू. पाँईटवरून शिवसागर जलाशयापर्यंत पर्यटकांना उतरण्यासाठी रोपवे साकारण्याची संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आहे. येथून पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने तापोळावरून महाबळेश्वरला जाता येणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस बांधण्यात आले असून के.टू. पाँईट पाटणपासून ३० कि.मी. अंतरावर तर कोयनानगरपासून लाँचने १२ कि.मी. अंतरावर येते .
हुंबरळी पॅगोडा
कोयनानगरपासून केवळ २ कि.मी.अंतरावर उंच ठिकाणी हुंबरळी येथे हा पॅगोडा आहे .पॅगोडापासून कोयना धरणाचा विलोभणीय ठेवा पर्यटकांना नजरेस येतो .
.त्यातच आजुबाजूच्या हिरव्या घनदाट जंगलांनी कोयना धरणाचे दृश्य आणखीनच विलोभनीय झाले आहे. प्यागोडाजवळच महाराष्ट्र टूरिझमचे कोयना लेक रिसोर्ट ,विन्डशाली रिसोर्ट, खास पर्यटकांसाठीच आहेत .
रामबाण तीर्थक्षेत्र
निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत . हे पर्यटकांचे भाग्याच म्हणावे लागेल . ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले . चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली . यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला . या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत नव्हता . अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला . त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला . सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली . अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते. आजही हा रामबाण तीर्थ असणारा पवित्र दगड नवजाच्या जंगलात पर्यटकांना पहावयास मिळतो. याठिकाणी रामनवमीला गावकरी उत्सव साजरा करतात.या उंच दगडात बाणाच्या प्रहराप्रमाणे आकार असून या बाणातून सहज ग्लासने पाणी काढता येते . येथील वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या अवतीभोवती कोणताही पाण्यासाठी पाझर नाही , अथवा पाण्याच्या समांतर रेषेवर जमिनीचा आधार नाही. उभ्या असलेल्या दगडावर जमिनीपासून ६ फुटाच्या अंतरावर या दगडात बारा महिने थंडगार पाणी असते . हे पाणी येथे येणारे पर्यटक व रामभक्त भक्तिभावाने रामबाण तीर्थ म्हणून प्राशन करतात.
अगदी किर्रर्र अश्या जंगलात असलेली ही ऐतिहासिक शिळा जिचा संदर्भ रामायणशी जोडला जातो...
@कोयनेच्या_जंगलातून
https://www.facebook.com/aaplapatan/
हेळवाकची रामघळ :-
हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
कोयनानगर येथे रहाण्याची सोयः-
१) कोयना लेक रिसॉर्ट:- कराड शहरापासून सुमारे 55 कि.मी. अंतरावर असलेल्या आणि ज्यांना नियमित रीतीच्या कामापासून रगाड्यापासून दूर होउन रीफ्रेश व्हायचे आहे त्याना कोयना लेक रिसॉर्ट हा उत्तम पर्याय आहे . कोयना लेक रिसॉर्टमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वातावरण मिळेल. कोयना लेक रिसॉर्टमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध आहे. कुटूंबासाठी योग्य सूट मिळेल. आपले मनोरंजन करण्याच्या बर्याच गोष्टी आहेत. आपण शेतात फिरू शकता आणि त्यांची लागवड होणारी पिके पाहू शकता, गोफणीने दगड फेकू शकता किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकत बसू शकता. कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प हे मुख्य आकर्षण आहे. कोयना लेक रिसॉर्ट हूंबर्ली (कोयनानगर) च्या टेकडीवर आहे आणि ती जागा समुद्रसपाटीपासून 3200 फूट आहे आणि सर्व ऋतूंमध्ये हवामान थंड,आणि सुखद असते. विशेषत: पौर्णिमेची रात्र असताना आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे.
यात 1 बंगला, 2 फॅमिली स्वीट्स आणि सुमारे 20 कॉटेज (एसी किंवा नॉन एसी) आहेत आणि दर रू. - ९०० - २०००/-. हा पूर्वीचा एमटीडीसी रिसॉर्ट होता, आता तो सांगली येथील साठे एंटरप्रायजेसच्या खासगी फर्मकडून चालविला जातो.
कोयना लेक रिसॉर्टकोयनागर. (जि. सातारा)
एच.ओ. साठे एंटरप्रायजेस, सांगली
फोनः - 0233-2374668 / 2381610
फॅक्स: - 0233-2322957 / 2381610
मोबाईल: - 9922112803
मोबाईल: - 9850573452
बुकिंगसाठी, भेट द्या - http://koynalakeresort.com/
ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत.
सह्याद्रीच्या कुशीत वाल्मिक पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. वाल्मिक ऋषींची तपोभूमी वांग नदीचे उगमस्थान असून जवळच नाईकबाबा हे धार्मिक ठिकाण आहे. याठिकाणी प्रत्येकवर्षी मोठी यात्रा भरते. याशिवाय एक आठवडाभर रामनाम जप, हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याचठिकाणी वाल्या कोळ्याने जप करून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले, अशी आख्यायिका आहे. तसेच वांग नदीचा उगमही येथे झाला आहे. हे सर्व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे पर्यटक येथे मोठी गर्दी करतात.कराड ढेबेवाडी मार्गे या ठिकाणी जाता येते तसेच मोरगिरी-पाचगणी मार्गे ही जाऊ शकतो.
नाईकबा
निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला सातारा जिल्ह्यातील. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कडेकपारीत वसलेला पाटण तालुका.डोंगराच्या माथ्याव, मध्याव आणि पायथ्याशी गर्द हिरव्यागार जंगलझाडीत विखुरलेली गावे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना आणि तिच्या उपनद्यांच्या दुतर्फा काठांवर वसलेली गांव.कोयना धरण परिसर , अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवज पावसाचे आगर ,ओझर्डे धबधबा, रिव्हर्स धबधबा अशी अनेकाविध प्रेक्षणिक पर्यटनस्थळे पाटण तालुक्यात आहेत.त्यापैकीच वाल्मिक पठार, दिवशी घाट,वांगमराठवाडी व महिंद धरणं, भोसगांव फुलपाखरु निसर्ग पर्यटन केंद्र आणि ढेेेवाडी वन विभागातील ओहळ ओढे, धबधबे, पशुपक्षी, वृक्षसंपदा आणि पठारावरील रानफुलांचा रंगिबेरंगी फुलोत्सव अशा सौंदर्य स्थळांनी समृद्ध असलेला ढेबेवाडी परिसर...याच भागात महाराष्ट्र व कर्नाटकातील समस्त जनांचे लाखो कुटूंबियांचे श्रध्दास्थान शक्ती भक्तीचे कुलदैवत असणारे श्री नाईकबा देवस्थान वांग नदीच्या परिसरात डोंगरावर आहे.श्री नाईकबा देवाचे मंदिर बनपुरी गावातील डोंगरावर असून घाटरस्त्याचा मार्ग आहे.असून जानुगडेवाडी येथूनही मंदिराकडे पायी चालत जाता येते.
यात्रेच्या वेळी लाखो भाविक श्री नाईकबाच्या देवदर्शनाला मनोभावे येतात.सगळे भाविक गुलाल-खोबऱ्याचं उधळण केल्याने अवघे पठार गुलालाने माखते. भाविक गुलाल खोबरे व नैवेद्य देवाला वाहतात.एकमेकांना आनंदाने कपाळी आनंद गुलाल लावतात.सजवलेल्या सासनकाठ्या नाचवत गावोगावीचे भाविक येतात.हलगीघुमक्याचा आवाज निनादत असतो .श्री नाईकबाच्या नावानं चांगभलं असा गजर , नामस्मरण सुरू असतं.घराला समृद्धी लाभावी.सगळ्यांना सुखसमाधान लाभावे.घरात आनंदी आनंद नांदावा म्हणून भक्तीचा सागर देवदर्शनाला येतो...
नाईकबाकडे घाटरस्त्याने आपण पठारावर येतो.. अवाढव्य पवनचक्क्यां नजर वेधतात.पायथ्यावरुन इवल्याशा दिसणाऱ्या पवनचक्क्या प्रत्यक्ष बघताना अजस्त्र आकारात दिसतात.त्यांचा टॉवर आणि वाऱ्याच्या वेगानं फिरणारी पाती जवळून पाहु शकतो.दुचाकी आणि चारचाकी गाड्या जागी पार्क करण्यासाठी व्यवस्था आहे. देवदर्शनाला निघालो कि देवाच्या अगाध लीलांची अवीट गोडवा गाणारी गाणी ऐकायला मिळतात. दुतर्फा अनेकविध दुकाने आहेत..प्रसाद,खाऊ घेण्याची आरोळी ऐकायला येतात.नवीन प्रशस्त मंदिराचे बांधकाम सध्या सुरु आहे.मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत.डोंगराचा राजा नाईकबा असं भारदस्त तेजःपुंज मुर्तीच मुखवट्याचे रुप दिसतं.नाईकबा भगवान शंकराचा अवतार मानला जातो.
तळबीड :
शिवाजीराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे हे जन्मगाव आहे. या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्मारक झाले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे. हे ठिकाण पुणे- कोल्हापूर रस्त्याच्या पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर आहे. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी सोयराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. ताराराणीबाईसाहेबांनी संताजी-धनाजी यांच्या साहाय्याने औरंगजेबाशी जो लढा दिला, त्याला इतिहासात तोड नाही.
हम्बीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.
हम्बीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. सम्भाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील सम्भाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हम्बीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हम्बिरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हम्बीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हम्बीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हम्बीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हम्बीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हम्बीररावांचे मोठे योगदान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्बीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हम्बीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हम्बीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हम्बीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हम्बीरराव मोहित्यांची नसून हम्बीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार 'सरसेनापती हम्बीरराव मोहिते' यांची आहे.)
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हम्बीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले सम्बन्ध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हम्बीरराव मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हम्बीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.
मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .
शम्भूराजेंच्या पाठीशी खम्बीर मामा हम्बीरमामा :-
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर सम्भाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच सम्भाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हम्बीररावांनाही मिळाले होते. हम्बीररावांनी सम्भाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
सम्भाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हम्बीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हम्बीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हम्बीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हम्बीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हम्बीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हम्बीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हम्बीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हम्बीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु हम्बीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.
या हम्बीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.
याच एतिहासिक तळबीड गावात अलीकडेच एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे, ते म्हणजे श्रीराम मंदीर.सोनेरी कळस आणि संगमरवरी फरश्या, सभोवताली सुंदर बगीचा यामुळे अतिशय आकर्षक असलेले हे श्रीराम मंदीर तळबीड भेटीत आवर्जुन बघावे.तळबीड गावाच्या पार्श्वभुमीवर एखाद्या पाठीराख्यासारखा वसंतगड उभा आहे.तर तळबीड गावात प्रवेश करताना मुख्य चौकात एका बाजुला सरसेनापती हंबीरराव मोहीतेंची समाधी तर एका बाजुला श्रीराम मंदीर आहे.
वसंतगड
या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने ११व्या शतकात केली. इ. स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड ताब्यात घेतला. किल्ला त्या वेळी मसूरचे आदिलशहाचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांच्या ताब्यात होता. याच महादजीला आठ-दहा वर्षांचा मुलगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या मुलाला आपल्यापाशी सांभाळले होते. पुढे जिंजीहून परत येताना छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इ. स. १७००मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले; पण इ. स. १७०८मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांच्या तोफांच्या भडिमाराने भग्न झाले आहे. गडावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गडाच्या मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधणीचे आहे. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. कोयना तळे व कृष्णा तळे अशी दोन तळी येथे आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारही बाजूंना चार बुरुज आहेत. पुणे-कोल्हापूर हमरस्त्यावरून हा किल्ला पश्चिमेला दिसतो. किल्ल्याच्या पूर्वेस तळबीड आहे. सदाशिवगड कराड शहराच्या पूर्वेला सहा किलोमीटरवर हा किल्ला आहे. गडावर असलेल्या शिवशंभू महादेवाच्या मंदिरामुळे या गडालासुद्धा सदाशिवगड असे नाव पडले. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर व गणेश यांच्या मिश्र धातूंच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असून, याचे क्षेत्रफळ २३ एकर एवढे आहे. वाट बांधीव पायऱ्यांची असून, सुमारे एक हजार पायऱ्या आहेत. हा किल्ला अफझलखानाच्या वधानंतर (१० नोव्हेंबर १६५९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटाकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी महाराजांनी याचा उपयोग केला. किल्ल्याचे क्षेत्र मोठे असले, तरी आता कोणतेही अवशेष नाहीत. येथे महादेवाचे मंदिर आहे.
कराड :
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेले कराड हे शहर कृष्णा व कोयना या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. कराडचा उल्लेख सातवाहन काळापासून विविध राजसत्तांच्या कालखंडात आलेला आहे.
ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.
महाभारतातिल उल्लेखानुसार कराड ही युधिष्टीराच्या राजसुय यद्याच्या वेळी दक्षिण दिग्विजयात सहदेवाने जिंकलेले एक नगर होते .
तिमिड्गल स च नृपं वशे कृतवा महामति :
एकपादाश्च पुरुषान्केरलान्धन् वासीन् : !!७१!!
नगरी स जयन्तो च पाषण्ड करहाटकाम्
दूतैरेव वशे चक्रे करं चैनान्दपायत् !!७२!!
( महाभारत सभापर्व ३१.७० )
अर्थ– त्या बुद्धिमान सहदेवाने तिमिड्गल यास वश् करून ?एकपाद केरल, वनवासी ही लोक नगरी संजायन्ती व ज्यात पाखण्डवादी लोक आहेत असे करहाटक (कश्व्हाड) ही (आपल्या) दूतांकडूनच ताब्यात आणले व त्याजकडून कर वसूल केला.
या स्थानाला अनेक पौराणिक संदर्भ लाभले आहेत. स्थानमाहात्म्य या उपलब्ध ग्रंथात या परिसरातील तीर्थक्षेत्राचे वर्णन केले आहे . या स्थानाच्या नावाबाबत करहटक , करहाकड , करहाट असे अनेक उल्लेख मिळतात. ल्युडर्स यांच्या मते यापैकी “करहकट” हे प्राचीनतम नाव असून उत्तरकालीन सर्व नावे त्याचीच अपभ्रष्ट रुपे आहेत
(सिद्धेश्वर शास्त्री चित्राव , प्राचीन भारतीय स्थळकोश, पृ.३७५)
या नावाची व्यत्पत्ती देताना कराह (कऱ्हा) + आहार = कऱ्हा नदीच्या काठचा आहार म्हणजे प्रांत अशी सांभाव्यता मानणाराही एक मतप्रवाह आहे
( एम.ए.डिसळकर, सदविचार वर्ष ६ ,३ डिसेंबर १९२७ पृ. क्र. १४१)
कराडचे प्राचीन उल्लेख थेट सातवाहन कालापासूनचे आहेत. आज कराड शहरात असलेला भुईकोटाच्या सर्वात खालच्या थरात सातवाहनकालीन अवशेष मिळत आलेले आहेत.जेव्हा जेव्हा कोयना नदीला पुर येई तेव्हा भुईकोटाच्या टेकडीखालचा थर उघडा पडून सातवाहन कालीन दागिने,मुर्ती वहात आलेल्या सापडल्या आहेत.
राष्ट्रकुट, चालुक्य आणि शिलाहार या राजसत्तांच्या अमलाखाली कराड राहिले होते. आक्रमक आदिलशाहीच्या कालखंडात काहीकाळ कराडचे नाव ' कलहराबाद ' असे असल्याचे उल्लेख मिळतात. शिवपूर्वकाळात 'पुणे प्रांत' व 'क-हाड प्रांत' हे दोन्ही विभाग शाहजीराजें यांच्या जहागीरीचा प्रदेश होता. इ. स. १६३८ - ३९ मधे शाहजी महाराजांनी आदिलशाहीतील सरदार रणदुल्लाखानासोबत केलेल्या पराक्रमासाठी कराड प्रांतातील २२ गावांची जहागीरी आदिलशाहने दिली होती. या प्रांतामधील मसूरचे जगदाळे व यादव यांच्या मधे अधिकाराचा संघर्ष इतिहासाने पाहिला आहे. छ. शिवाजी महाराजांनी इ. स. १६५९ च्या प्रतापगड रणसंग्रामानंतर पन्हाळ्यापर्यंतचे किल्ले व मुलूख स्वराज्यात दाखल केला. कराड परिसरातील वसंतगड, सदाशिवगड इत्यादी किल्ले देखील परकीय अमलातून मुक्त होऊन स्वराज्याचा भाग झाल्याने रयतेने आणि सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी मोकळा श्वास घेतला.
कराड हे चिपळूण-पंढरपूर-विजापूर या नवीन जाहीर झालेल्या महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे.शिक्षण संस्थांचा विचार केला तर इथे काय नाही ? वैद्यकीय, अभियांत्रिकी, कॉमर्स, व्यवस्थापन इत्यादी शिक्षणाची सोय आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत १९५४ साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्थापन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च् शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविध्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय्,शासकीय कृषी महाविद्यालय आहेतच्,पण अभियांत्रिकी ज्ञान देणार्या खाजगी संस्थाही आहेत.
कराड परिसरात औद्योगिक वसाहतही आहेत. तसेच व्यापाराच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे ठिकाण आहे. किल्ले सदाशिवगडाच्या पायथ्याला भुकंप संशोधक केंद्र उभारले जात.भुकंपावर जागतिक दर्जाचे संशोधन इथे केले जाईल.
कराड येथेही कृष्णबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. कराडला लागूनच ‘मलकापूर’ नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. कृष्णा मेडिकल चॅरिटेबल ही संस्था मेडिकल कॉलेज व आधुनिक पद्धतीचे उपचार यांसाठी या भागात प्रसिद्ध आहे. कराड येथे छोटा विमानतळही बांधण्यात आला आहे. तो प्रवासी वाहतुकीला उपलब्ध नाही.त्याठिकाणी विमानाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
२०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत.
महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे सुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
कराड दक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाबाई यांनी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराडचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
कराड राजकीय , सांस्कृतिक , आर्थिक, ऐतिहासिक , औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे. तसेच येथील लोकांना कृष्णाकाठचे लोक म्हणूनही संबोधले वा ओळखले जाते. कराड ला लाभलेल्या सुंदर वारस्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कराड नावाजलेले व प्रगत आहे. कृष्णाकाठची माणस प्रेमळ व सुस्वभावी आहेत. तसेच येथील कर्तबगार थोर व्यक्तिमत्वांमुळे कराड कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दिसून येते.कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभला आहे.
कराड, कोरेगाव, सातारा, रहिमतपूर ही ठिकाणे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत.सध्या पुणे-मिरज-बेंगळुरु लोहमार्ग कराडवरुन जातो.कराड-चिपळूण-जयगड व कराड-इचलकरंजी-बेळगाव हे प्रस्तावित लोहमार्ग आहेत.
भारताचे माजी उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तबगारीने कृष्णाकाठ गाजला.. कराडच्या प्रितीसंगमाने जगाला संवेदनशील भक्तीचा संदेश दिला.. कराड ही मानवतेची कार्यशाळा आहे.. कराड विठ्ठलभक्त जरुर आहे.. त्याचबरोबर कराड ही माणुसकीचा गहीवर आहे.. इथे श्रमाला प्रतिष्ठा आहे.. या कराडने सदा भारतीय संविधानाचा सन्मान केला आहे.. कराड सहिष्णू आहे.. सह्याद्रीच्या शिरपेचातील कराड हा मानाचा तुरा आहे.. इथल्या शिक्षण संस्था.. शाळा काॅलेजीस.. कारखाने.. शेती.. उद्योग धंदे.. इथली धर्मनिरपेक्ष विचारसरणी.. याच सुपिक मातीने छ. शिवबांच्या कृष्णा घोडीच्या टापांचा आवाज ऐकला.. सह्याद्रीच्या कडेकपारीत सामान्य घरात जन्मास आलेल्या राकट कणखर तरुणांनी स्वातंत्र्य चळवळ गाजवली.. लष्करात कराडच्या सुपुत्रांनी पराक्रम केला.. याच कराडने हिमालयाचे रक्षण केले.. सह्याद्रीची शान वाढविले.. यशवंतराव आणि वेणूताईच्या रुपात कराडने दिल्ली दरबाराचे वैभव वाढविले...पृथ्वीराजनी महाराष्ट्राच्या नकाशावर कराडला मानाचे स्थान मिळवून दिले.. सिक्कीमच्या राजभवनात विराजमान झालेले कराड.. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाटीवर कलेक्टर म्हणून मिरवलेले कराड... पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे कराड.. स्वाभिमान जपणारे कराड.. चव्हाण आणि पाटलांचा कराड.. बारा बलुतेदार अठरा पगड जाती जमातीला एकत्र गुण्यागोविंदाने नांदवणारे कराड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे वैभव आहे.
कराडची खाद्यभ्रमंती :-
पुणे-बेंगळुरु अशियाइ महामार्ग, गुहागर, विजापुर राष्ट्रीय महामार्ग , कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग यावर कराड शहर वसलेले असल्यामुळे कराड परिसरात मोठ्या प्रमाणात ढाबे,हॉटेल्स आहेत.सातारा जिल्ह्यात महामार्गावर सातारा हे प्रमुख शहर आणि याशिवाय शिरवळ्,उंब्रज,भुइं़,पाचवड अशी गाव असली तरी उत्कृष्ट जेवणाची चव घ्यायची असेल तर कराडला पर्याय नाही.
तर आपण माहिती घेउया कराड शहर आणि परिसरातील खादाडीच्या ठिकाणांची.
शाकाहारी पदार्थः-
खादाडीसाठी प्रसिध्द असलेल्या प्रत्येक गावाची स्वताची अशी स्पेशालिटी असते.जसे कोल्हापुर मिसळ्,पांढरा,ताबंडा रस्सा, पुणे बाकरवडी,पॅटीस्,मुंबई बटाटेवडा वगैरे.कराडचे आदरातिथ्य पुर्ण होते ते आख्खा मसुर खाउनच.वास्तविक हा पदार्थ महाराष्ट्रात इतरत्रही मिळतो.पण इथल्या जमीनीची आणि कृष्णा,कोयनेच्या पाण्याची चव मिसळल्यावर अप्रतिम आख्खा मसुर तयार होतो तो फक्त कराडला.तर मंडळी हा आख्खा मसुर कराड परिसरात बहुतेक ठिकाणी चांगला मिळत असला तरी ऑथेंटीक आख्खा मसुर खायचा असेल तर कराड-चिपळूण रस्त्यावरील पाटण तिकाटण्याजवळच्या शिवराज ढाब्याला पर्याय नाही.आख्खा मसुर बरोबर इथे काजु करी, बैंगण मसाला आणि मडक्यातील दही उत्तम मिळते.शिवराज ढाब्याने आता कराड शहरात आणि इतर शहरातही पार्सल देणारी फ्रँचायजी सुरु केल्या आहेत.
कराडमधून पुण्याच्या दिशेने निघाले कि तासवडे टोलनाका लागतो.इथे हॉटेल राउ आहे.इथेली स्पेशालिटी म्हणजे मिसळ, झुणका भाकरी . राऊ हाॅटेल वहागावला आहे.राऊ हाॅटेल मध्ये थालीपीठ मिळतात.घाटावर चुलांगण मध्ये भाकरी, पिठलं असे जेवण छान मिळते.इथून काही अंतर पुण्याच्या दिशेने गेल्यास उजवीकडे मसुरमार्गे पंढरपुरला जाणारा फाटा लागतो.याच बाजुला गणेश ढाबा आहे.लक्षात त्या परिसरात अनेक गणेश ढाबे असले तरी कोल्हापुर बाजुच्या रस्त्यावर तोच खरा गणेश ढाबा.इथे काजू करी, कांदा फ्राय, आलू पराठा याची चव नक्कीच घेउन बघा.
कराड शहराच्या बाहेर हॉटेल पंकज हे आपले स्वागत करते.इथेही शाकाहारी थाळी,पंजाबी,मांसाहारी जेवण उत्तम मिळते.शिवाय चेरी ऑन द केक म्हणजे पंकजच्या बाहेर मिळणारे पान.
याशिवाय पुणे -बेंगळूरू महामार्गाला लागून हॉटेल सागर्,वारणा, गंधर्व पॅलेस, शाही,तृप्ती अशी आणखी हॉटेल्स आहेत.इथेही उत्तम खाणे मिळते.कोल्हापुर नाक्यावर डॉमिनोजचे आउटलेट आहे.
आता आपण जीभेची हौस पुरवणार आहोत ती कराड शहरातील भटकंतीत.
दत्त चौकात मिसळहाऊस मिसळीच्या व्हरायटी मस्तच आहेत.दत्त चौकात असलेल्या गजानन रेस्टॉरंटने वर्षानुवर्षे खवय्यांची रसना शमवली आहे.मिसळ आणि साबुदाणा खिचडी हि इथली खासीयत. वडा,पाव तसा कोठेही छान मिळत असला तरी बस स्टँडच्या बाहेर मिळणारा साईनाथ वडा विशेष उत्कृष्ट आहे.गाड्यावर सुरु केलेला हा व्यवसाय आता समोरच दुकानात सुरु झाला आहे.याशिवाय कन्या शाळेसमोर वरद वडापाव,दत्त चौकात साईबाबा मंदिराच्या कोपऱ्यावरचा वडा उत्तम,
सावळाराम गोल भजी, सुर्याज् चिकन तंदूर, काॅर्नर ढाबा सर्वसाधारण चुलीवरचे जेवण, मंगळवार पेठेतील ज्योतिबा मंदिराजवळ कोल्हापुरी मध्ये कच्ची दाबेलीच्या खूप व्हरायटी आहेत. बॉम्बे (मुंबई)हॉटेल चावडी चौक अंबोळी. कन्या शाळेजवळ गेल्यास आवर्जून खावा असा पदार्थ म्हणजे दावणगिरी लोणी डोसा. हॉटेल मथुरा , शाहू चौक ,बेस मेन्ट ,कराड-- कांदाभजी चटणी (भजी ठीक पण चटणी एकदम सुंदर), अन्नपूर्णा हाॅटेल पनीरचे निरनिराळ्या प्रकारच्या डिशेस, एस. जी. एम समोर तंदूर चहा मस्तच मिळते. सिंडीकेत बँकेच्या कॉर्नरवर बासुंदी चहा, गुरुवार पेठेत मेन रोडवर कमानी मारुती शेजारी बासुंदी चहा मस्तच मिळतो.
बहुतेक ठिकाणी असा अनुभव येतो कि बस स्टँडसमोरच्या हॉटेलमध्ये पदार्थाची चव आणि दर्जा यथातथाच असतो.मला स्वतःला तरी फक्त दोन गाव अपवाद मिळाली आहेत.कोल्हापुर आणि कराड.थेट बस स्टँडबाहेर अलंकार हे लॉजिंग आणि बोर्डींग आहे.इथे पंजाबी जेवण उत्तम मिळतेच पण त्यांच्याच आर्यामध्ये गुजराती थाळी देखील छान मिळते.जवळच असलेल्या भाग्यश्री व तृप्तीमध्ये ही जेवण चांगलया चवीचे मिळते. याशिवाय कृष्णा नाक्यावरचे सुर्या हॉटेल, शुक्रवार पेठेतील स्थालीपाक इथेही चांगले जेवण मिळते.
कराडच्या खाडादीविषयी बोलायचे आणि एका ठिकाणाचा उल्लेख करायचा नाही असे होणार नाही. ते ठिकाण म्हणजे कृष्णा घाट.अर्थात कराडकर त्याचा उल्लेख फक्त घाट असाच करतात.जसे इंदोर त्याच्या खाउगल्लीसाठी प्रसिध्द आहे, तसेच कराडची हि खाउ गल्लीच म्हणावी लागेल.कृष्णा घाट हा दगडी पायर्यांचा प्राचीन घाट आहे.जवळच कृष्णाबाई हे नदीला मुर्तीस्वरुपात पुजल जाणारे मंदीर आहे.जवळच श्रीकृष्ण मंदीर, कार्तिकेय मंदीर, काशीविश्वेश्वर मंदीर अशी बरीच मंदीर आहेत.या परिसरात रस्त्याचा जो मोकळा भाग आहे, इथे खाण्याच्या पदार्थाचे गाडे कायमस्वरुपी लावलेले असतात. पाणीपुरी,भेळ्,पावभाजी,आईस्क्रीम, डोस्याचे विवीध प्रकार्,आंबोळी,उकडलेली कणस, सँडविच, कॉफी ते अगदी आईसगोळा असे सर्व पदार्थांचा फन्ना उडवायचा हा कराडकरांचा नित्यक्रम्,दिवसा इथे तुरळक गर्दी असली तरी संध्याकाळ झाली कि हा परिसर गर्दीने फुलून जातो.कृष्णा घाटाच्या पायर्यावर बसून नदीवरुन येणार्या,सुखावणार्या वार्याचा झोत घेत हे खाद्यपदार्थ खाणे हा अनेकांचा विरंगुळा आहे.नवख्यांना इथे रोज कोणती जत्रा भरते असा स्वाभाविक प्रश्न पडतो.पण कराडच्या भेटी संध्याकाळी न चुकता भेट द्यावी असे हे ठिकाण.
मासाहारी पदार्थ :-
कराडला जितकी शाकाहारी पदार्थाची व्हरायटी मिळते तितकेच वैविध्य मासाहारीप्रेमींच्या जीभेचे चोचले पुरवणारी हॉटेल राखून आहेत. उत्कृष्ट मटण, मटण, कडक भाकरी व यात्रा स्पेशल रस्सा ,अनलिमिटेड, फाइव स्टार ढाबा विमानतळा समोर कराड, भारत ढाबा पातळ भाकरी आणि रस्सा, दख्खन ढाबा खर्डा मटन काळे मटन कलेजा फ्राय, सन्मान हाॅटेल मच्छिचे निरनिराळे प्रकार, पाटिल वस्ताद सुके मटन चिकन, हाॅटेल ग्रीनलँड बार्बेक्यु पदार्थ चिकन मटन निरनिराळ्या प्रकारचे मासे,हाॅटेल रायगड पाचवड फाट्याजवळ सुके मटन रस्सा. खुशबू ढाबा इथे अंडा करी, भाकरी, आवटे आणि सुतार ब्रदर्स, सुके मटण चिकन रस्सा चपाती भाकरी बी राईस मटण चिकन बिर्याणी दम बिर्याणी सर्व उत्कृष्ट मिळते. हॉटेल शिव नॉनव्हेज साठी, रविवार पेठ, कुंभार गल्लीतील आमणे यांचे घरगुती जेवण, मटण ताट.सुनिल पद्माळे, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड. सुके मटण, रस्सा, बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी.
कृष्णा घाट :-
या शहराच्या उत्तरेकडे पवित्र अशा कृष्णा-कोयनेचा संगम झाला आहे. यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजुला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे तसेच अनेक नवनवीन खेळ बसविण्यात आले आहेत. या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश मिळतो. सर्वात जुने मंदिर रत्नेश्वराचे याच घाटावर आहे. या मंदिरावर मुस्लिम शिल्पकलेप्रमाणे ४ मनोरे व हिदू कलेप्रमाणे कळस या मंदिरावर बघायला मिळतो. कृष्णामाईच्या देवीची यात्रा चैत्र वद्य १ व शेवटच्या श्रावणी सोमवारी भरते.
प्रीतिसंगम हे उद्यान साडेपाच एकर जागेत आहे. उद्यानाच्या सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा पाच फूट रुंदीचे ‘फ्लॉवर बेड’ तयार करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी वळणे असलेले रस्ते आहेत. बाकीच्या भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. तेथे झाडे लावताना ती विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत.
उद्यानामध्ये विद्युत प्रकाशाची योजना विशिष्ट प्रकारची करण्यात आली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या झगमगत्या कांरज्यांची योजना केलेली आहे.
यशवंतराव चव्हाण यांची समाधी :-
कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. या समाधिस्थानाजवळ एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे, तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेबरोबरच पर्यटक व राजकीय नेतेमंडळींचीही वर्दळ वाढली आहे.
प्रीतिसंगम
कराड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. शिवछत्रपती महाराजांनी अफजल खानाला ठार मारल्यानंतर विश्रांती न घेत २१ दिवसात १८ किल्ले जिंकले...तेव्हा वाटेल कराडजवळ याच कृष्ण कोयनेच्या संगमावर शिवरायांच्या शिवगंगेने आपली रक्ताने माखलेली हत्यारे धुतली असा इतिहास आहे...! तेव्हा पासून हा आमचा संगम केवळ संगम न राहता कृष्ण कोयना आणि शिवाजी ( महाराज ) असा त्रिवेणी प्रीती संगम झाला आहे...! कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे.उत्तरेहून वाहत येणरी कृष्णा आणि दक्षिणेहून येणरी कोयना.दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातले नाही.पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे असे म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान आहे.
पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद. तसं म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच की..महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फ़रक!! थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वागणारी. ही लहान मुलीसारखी डोंगर-दऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती लवकर पठारावर यायची. तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजे-तवाने करण्याची. तर धाकटी बहिण कोयना म्हणजे महा खोडकर….. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे…प्रतापगड, मकरंदगड आणि वासोटा. जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण. पण धाकटी असली तरी अंगात जोर फार…अर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवते म्हणे ही! तर अशा या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी….जबाबदारीने वागणारी कृष्णा तर डांबरट कोयना, ऊसशेती समृध्द करणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना, वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडावरच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना. पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात.
विशेष म्हणजे या दोन्ही नद्या महाबळेश्वरला एकाच ठिकाणी उगम पावतात्,कृष्णा पुर्वेकडे धावत सुटते, तर कोयना जावळी खोर्यात झेप घेउन प्रतापगडाला चरणस्पर्श करीत, पारच्या एतिहासिक पुलाखालून वहात वासोटा, मधुमकरंदगडाची शिखर न्याहाळत, कोयनेच्या धरणात स्वताला बंदीस्त करुन घेते.दोन्ही काठावर घनदाट अभयारण्य फुलवित आणि वन्य प्राण्यांची तहान भागवत स्वताला नवजाजवळ एका अरुंद छिद्रात लोटून देते आणि सह्याद्रीच्या गर्भात उभारलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पाची पाती फिरवत महाराष्ट्रासाठी वीजेची भाग्यलक्ष्मी होते.महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांची तहान व शेताच्या सिंचनाची काळजी लागून ती कोयनानगरला थांबत नाही तर आपली बहीण कृष्णेच्या ओढीने कराडनगरीकडे धावत सुटते.इकडे कृष्णा बलकवडी,धोम अशी धरणात स्वताला बंदीस्त करुन घेते. मात्र पुर्व समुद्राची तीची ओढ गती थांबवत नाही.वाई,माहुली,लिंब अशी तिर्थक्षेत्र पावन करीत ती कराडला पोहचते आणि आपल्या दुरावलेल्या बहिणीशी थेट समोरासमोर गळाभेट घेते आणि अस्तित्वात येतो तो जगातील एकमेवाद्वितीय प्रितीसंगम. विशेष म्हणजे या दोन्ही नद्या महाबळेश्वर ते कराड अगदी सारखे अंतर पार करुन एकमेकीला मिळतात.इथे दोन्ही नद्या मिळताना त्यांच्या पाण्याचा रंग वेगळा दिसतो, मात्र कोयनेचे तुलनेने निळसर पाणी नावाप्रमाणे काळसर असणार्या कृष्णेच्या पाण्यात मिसळून जाते आणि पुढे कृष्णा निघते ती टेंभुच्या जलाशयाकडे दुष्काळी भागाची तहान मिटवायला. इथे कॄष्णा कराडनगरीला दक्षिणेकडून पुर्ण वळसा घालून जणु प्रदक्षिणा पुर्ण करते आणि औदुंबर,सांगलीकडे वाहु लागते.दोन्ही नद्यांच्या या प्रवाहामुळे कराडभोवती नद्यांचा ओम सारखा आकार तयार झाला आहे.गुगल मॅपवर हे बघून खात्री करता येईल.
उत्तर भारतात जे स्थान गंगा-यमुनेला तेच महाराष्ट्रात कृष्ण-कोयनेला… आणि कराड म्हणजे इथले ‘प्रयाग‘. कृष्णेचा किंवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणुस सहसा करत नाही. आपण नेहमी “कृष्ण- कोयना” असेच म्हणतो. उदारणार्थ हे महाराष्ट्रगीत..
रेवा वरदा, कृष्ण-कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता.. कशासाठी पोटासाठी देशासाठी देशासाठी गंगा आणि गोदेसाठी कृष्ण-कोयना यांच्यासाठी…
कराडचा प्रितीसंगम इतका सुंदर आहे की उत्तरालक्ष्मी पासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळेच जण याच्या सौंदर्याला भुलले. त्यामुळेच या संगमावर जसे उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे तसेच यशवंतराव चव्हाणांची समाधी पण आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी “राजा शिवछत्रपती” मध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे फार सुरेख वर्णन केले आहे.कृष्णा-कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतिसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचे शांत आणि कोमल रुप दिसते तर पावसाळ्यात याने खवळलेल्या समुद्रासारखे रौद्र रुप घेतलेले असते. कधी कराडजवळ आला तर इथले पाणी डोळ्याला लावा.. जीवन सार्थक झाल्याचे समाधान मिळेल.
कराड येथील पंतप्रतिनिधीचा भुईकोट –
सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर वसलेले पौराणिक इतिहास लाभलेले कऱ्हाड या गावी बहामनी राजवटीत एक प्रचंड मोठा भुईकोट बांधला गेला. कराड येथील भुईकोट किल्ला एकेकाळी कऱ्हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या साधारण वायव्य दिशेकडे सुमारे८४ चौरस मीटर क्षेत्रावर उंच जागी या किल्ल्याचे काही अवशेष(नाममात्र) पहावयास मिळतात. पुढे हा किल्ला थोरल्या शाहु महाराजांच्या काळात प्रतिनिधींच्या ताब्यात आला. आज किल्ल्याचे दोन बुरुज कसे तरी आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. तटबंदीचे अवशेष चोहो बाजूला भग्नावस्थेत पहावयास मिळतात किल्ल्यातील प्रतिनिधी वाद पूर्णपणे उध्वस्त झालेला दिसतो १९९९ साली प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्हा गॅझेटमध्ये त्याचे स्थूल मानाने वर्णन लिहलेले दिसते.त्यावेळी मुख्य प्रवेशद्वार आणि त्यास घट्ट पकडून ठेवणाऱ्या दोन बुरुजांचे अवशेष बऱ्यापैकी शिल्लक आहे. चौरस आकाराचा हा किल्ला ईशान्यकडे थोडासा पुढे आलेला होता.किल्ल्याला १८ बुरुज होते.दगडमातीच्या प्रचंड तटबंदीला जंग्या होत्या. भोवताली सुमारे २ मीटर खोलीचा खंदक होता.कोयना नदीच्या पात्रापासून १४ ते ३० मीटर उंचीवर हा किल्ला एके काळी भुईकोटांचा जणू राजा दिसावा या थाटात कऱ्हाडचा भूमीवर राज्य करणारा चालुक्य,राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या वैभवाचे दर्शन घडवीत होता. थोरल्या शाहू महाराज यांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. किल्ल्यातील प्रतिनिधी वाडा म्हणजे मराठकालीन वास्तुशैलीचे एक अप्रतिम उदाहरण होते.वाड्याच्या दक्षिणेस २५×९|| मी.लांब रुंद व ४ मी.उंच असा दरबार हॉल होता.त्याच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानी देवीची छत्री होती.आजही आपणांस ते मंदिर पहावयास मिळते. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे १३ व्या शतकातील असावे असे मानले जाते. दरबाराचा तक्तपोशिवर जाळीदार नक्षीकाम होते.असे म्हटले जाते की,सण १८०० च्या सुमारास परशुराम श्रीनिवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. आज किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरेच घरे झालेली दिसतात. त्यामुळे कालांतराने किल्ला येथेच होता का हा प्रश्न अभ्यासकांच्या पुढे उभा राहील.कोयना पात्रालगतची तटबंदी१८७५ च्या महापुरात नष्ट झाली असावी.
नकट्या रावळाची विहीर :-
किल्ल्यातील बारव-किल्ल्यात एक अप्रतिम अशी पाय विहीर आहे. कराडचा ऐतिहासिक वारसा याच नकट्या रावळाची विहिरीमुळे सोमवार पेठेतील पंताच्या कोट परिसरात टिकून असल्याचे पाहण्यास मिळते. तेथील भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी ती पायविहीर आहे. तिला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ती विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रात असून सुमारे पंचाहत्तर फूट उंचीवर आहे.
ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला असून विहिरीची लांबी १२०×९० फूट लांबी रुंदीच्या पायऱ्यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो.११×११ चौरस मीटर मुख्य विहीर असून तिच्या ईशान्य बाजूला थोडा गोलाकार भाग दिसतो. विहिरीत उतरण्यासाठी पायर्यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. एकूण८२ पायऱ्या असून प्रत्येक २० पायऱ्या संपल्यावर मोठी पायरी (Landing) थांबण्याची जागा आढळते. पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते.विहिरीचे पूर्ण बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे असून ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा ठेवल्या दिसतात. ही विहीर केंद्रीय पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून ठरवली आहे. या विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडत असावेत.कारण तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकी असावी.अनेक मजल्यांच्या विहिरींचा उपयोग पाणीपुरवठा किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावे असे सातारा जिल्हा गॅझेटिअर म्हणते.
विहिरीतील घडीव दगडांच्या प्रशस्त पायर्या संपल्यानंतर दोन मोठे दगडी स्तंभ असून त्यावर कमान आहे. कमानीत दोन उपमार्ग आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विहिरीची देखभाल; तसेच, तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला होता. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना 2005 नंतर करत त्या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे त्या परिसरात झाली आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर तिच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर विहिरीसभोवताली भिंती घालण्यात आल्या असून प्रवेशव्दाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे. नकट्या रावळाची विहीर हे नाव तेथील राजाच्या नावावरून पडले असावे असे म्हटले जाते.
ऐतिहासिक मनोरे
भुईकोट किल्ला, पायर्याची विहीर हे मध्ययुगीन अवशेष तर आगाशिवची लेणी या प्राचीन कालखंडाच्या खुणा असा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कराडच्या मध्यवर्ती भागात बहामनी कालखंडाची एक खुण आहे.या मनोरे मशिदीबद्दल आता माहिती घेउया.
कराडची ही मशीद मनोऱ्याची मशीद म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारण असे की मशिदीच्या तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ दगडी चौथऱ्यावर दोन्ही बाजूस जवळ जवळ 32 मीटर उंचीचे मिनार उभारलेले आहेत.
कराड मधील एक प्रेक्षणीय स्थळ मनोरे. मनोरे म्हणजे एक जुनी दगडी मशीद आहे. कराड शहरात मुस्लिम बांधवाची संख्या मोठी आहे. या मशिदीत रोज अनेक लोक नमाज पढण्यासाठी येतात. हि मशीद विजापूरचा सुलतान अली आदिलशहा पहिला याच्या १५५७ च्या काळात इब्राहिमखान याने उभारली.मशिदीचे बांधकाम दगडी आहे. छताजवळ बाहेरच्या चारही बाजूंना कोरीव नक्षीकाम आहे. मशिदीच्या आतमध्ये दगडी शिल्लालेखावर उर्दू भाषेत कोरलेला काही मजकूर आहे. या मशिदीत असलेल्या शिलालेखांवरून असे समजते की वास्तू हिजरी ९८० (इसवी सन १५७२|७३) ते हिजरी ९८३ (इसवी सन १५७५|७६) या काळात बांधून पूर्ण झाली. ज्या शिलालेखात याच काल उल्लेख आला आहे तो शिलालेख दक्षिणेच्या खांबावर उत्तर बाजूस जमिनीपासून सुमारे ५ फुटांवर आहे. ज्याची लांबीरुंदी १’६ व १’२ आहे या लेखाभोवती नक्षीदार कमान केली आहे. ४ओळींचा असलेला हा फारसी शिलालेखातून अशी माहिती मिळते की ही, इमारत(मशीद) बांधण्याचे काम ‘पहिलवान अली बिन मुहम्मद इसफहानिस तीरेअंदाज खान’ याकडे सोपवले आहे. त्यांनतर इमारत बांधणीचे वर्ष हिजरी ९८० ते ९८३ असे दिलेले आहे.
या व्यतिरिक्त मशिदीत अजून फारसी शिलालेख आहेत त्यातील एकावर शहा अली आदिलशाह याचा उल्लेख आला आहे. आणि त्याच्या कारकिर्दीत या इमारतीचा पाया रचला गेला अशीही माहिती आली आहे. याशिवाय इतर जे शिलालेख आहेत त्यात कुराणातील वचने खोदलेली आहेत. येथे लहानमोठे असे एकूण 9 शिलालेख मिळाले आहेत.
मशिदीच्या आवारात हमामखाना (स्नानगृह) आणि खानिका (सुफीच्या राहण्याची जागा) आहे. मशिदीच्या पुढे नव्याने उभारण्यात आलेल्या मंडपामुळे दर्शनी भाग झाकला गेला आहे. या मशिदीच्या मागे लाकडे महाव्दार असून त्याच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०६ फूट उंचीचे दोन गोलाकार मनोरे बांधण्यात आले आहेत. मनोर्यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जीने बांधण्यात आले आहेत. मनोर्यांच्या शिखरावरुन कराडच्या भोवतालचा लांबवरचा परिसर दिसतो.
संदर्भ ऐतिहासिक फारसी साहित्य खंड,१ सातारा गॅझेटिअर
संत सखु मंदीर :-
संत सखूबाईच्या विठ्ठल भक्तीने कृष्णा काठावर विठू नामाचा गजर झाला. एका ब्राह्मण कुटुंबाची सून.. सदानकदा विठ्ठलांच्या ओढीने जीव कासावीस होत असे.. असेच एकदा आषाढी एकादशीला कृष्णा नदीवर सखू पाणी भरायला आली तेवढ्यात विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी जाताना सखूने पाहिले.. दिवस भर राबराब राबून घरकाम करणाऱ्या सखूला कधी एकदा पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेईन असे झाले होते. घरात किंमत नव्हती... शिव्याशाप, मारझोड हे तिच्या पाचवीला पुजलेले... दिंडीत सहभागी झाली.. घरच्यांना कळले.. तिला ओढत फरफटत घरी आणण्यात आले.. दोरीने बांधून घातले.. मारझोड झाली.. उपाशी ठेवण्यात आले.. पण विठ्ठल नामाचा गजर सुरुच ठेवला.. शेवटी साक्षात भगवानाने स्त्री रुप धारण करून सखूची सुटका केली व स्वतः दोरीने बांधून घेतली.. सखू पंढरीत पोहचली.. भजन किर्तनात दंग होऊन तिने तेथेच देह ठेवला.. अंत्यसंस्कार करण्यात आले.. साक्षात भगवंतानी पुन्हा तिच्यात प्राण भरुन तिला जिवंत केले.. घरच्यांना पश्चाताप झाला.. भक्तीचे महात्म्य कळाले.. त्यांचे मतपरिवर्तन झाले.. आणि कराडच्या भूमीने संत मालिकेत संत सखूची भर घातली.. ही घटना कराडमध्ये घडल्याचा इतिहास आहे.. खरी भक्ती आणि त्याची ताकद काय असते हे कराडने जगाला दाखवून दिले..प्रख्यात लेखक प्रा. के. अत्रे यांनी संत सखू हा चित्रपट प्रदर्शित करुन कराडची विठ्ठल भक्ती जगासमोर आणली आहे. संत सखूबाई समाधी व मंदीर हे केवळ कराडचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे.
अल्पसा इतिहास... 17 व्या शतकात छत्रपती शाहू महाराज (सातारा) म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम मिळाल्याचे म्हटले जाते तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रतिनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान होते. त्यांनी इथं दिवाबत्तीची सोय केली होती. मंदिराचा परिसर हा 20 गुंठे एवढे क्षेत्रफळ आहे. 17 व्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर म्हणूनच ओळख जायचं नंतर आदिलशाह च्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे ही बदलेली होती त्यावेळी शिवापूरची ओळख पुसून सय्यदपूर करण्यात आले होते त्यानंतर अपभ्रंश होत सैदापूर झाला. याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पुर्वाभिमुखी असे पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. काय आहे मंदिरात... पावकेश्वर मंदिराचे बांधकाम हे साधारण सतराव्या शतकात झालेले असून मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेने बांधणी केलेले आहे. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे की, शिवलिंगावर ओतलेल पाणी (अभिषेक पाणी) हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते. पण श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे. इथं गोमुखाऐवजी मकरमुखातून (मगरीचे तोंड)बाहेर जाते. मगर ही गंगेची कन्या मानली जाते. अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे असा समज असे. हे शिल्प फार कमी मंदिरात पहावयास मिळते. साधारण असे 13 व्या शतकातील मंदिरावर असे शिल्प दिसून येतात. मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर होती परंतु ती कालांतराने मूजविण्यात आली पण त्या विहिरीचे अजूनही चौथेरे दिसून येतात. एकूणच श्री पावकेश्वराचे मंदिर प्राचीन व पवित्र असे शिवलिंग मंदिर आहे. मंदिरास दोन दरवाजे असून एक दरवाजा पूर्वेला आणि दुसरा दरवाजा उत्तरेस आहे. पूर्वेच्या दरवाजा बाहेर उंच अशी एक दीपमाळ आहे. ही दीपमाळ 13 व्या शतकातील असावी. मंदिराचा परिसर पूर्णपणे तटबंदी वजा शैलीमध्ये बंदिस्त आहे. तटाच्या आतील उत्तर बाजूस राहण्यासाठीची सोय दिसते. परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले. तशा खुणा स्पष्टच मंदिरावर दिसून येतात.
मंदिराच्या समोरील नंदी आणि त्याची एकूण रचना पहाता हा नंदी प्राचीन असल्याचे साक्ष देतो. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या शिवलिंगाची आकारावरून हे शिवलिंग 13 व्या शतकातील असावे असे सांगता येते. मंदिराच्या आतील बाजूची रचना पाहिल्यास पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशाप्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आले. बेलपत्र, शरभशिल्प, गजमुख, कीर्तीमुख, मकरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी या सारखे रचनात्मक शिल्पवैशिष्ट्ये येथे ठळकपणे दिसून येतात. मंदिराचा शिखराचा भाग हा नंतरच्या काळातील म्हणजे शिवकाळात पुन्हा बांधला असावा, असे मानायला जागा आहे.
कराड पंचक्रोशीत 12 ज्योतिर्लिग आहेत 1. संगमेश्वर अर्थात गरूडतीर्थ - प्रितीसंगमजवळ 2. कमळेश्वर - मंगळवार पेठेतील करडे पीराजवळ 3. गोळेश्वर - गोळेश्वर गाव 4. कपिलेश्वर - कापिल गाव 5. निळकंठेश्वर - आगाशिव डोंगराव 6. वरूणेश्वर - वारुंजी गाव 7. धर्मेश्वर - वनवासमाची 8. कोटेश्वर - खोडशी गाव 9. निळेश्वर - वडोली निळेश्वर गाव 10. आनंदेश्वर - गोटे गाव 11. हटकेश्वर - कराड 12. रत्नेश्वर - कृष्णाकाठी भटांच्या बागेत त्यापैकी श्री पावकेश्वर हे सर्वात प्राचीन मंदिर होय.
कृष्णा-कोयनेच्या परमपवित्र अशा तीरावर वसलेल्या मौजे सैदापूर गावातील श्री पावकेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार तातडीने होणे गरजेचे असून, वेळेत हा जिर्णोद्धार न केल्यास गर्भगृहाच्या कललेल्या भिंती कोसळू शकतात. मूळचे 13 व्या शतकातील असलेले आणि शिवकाळामध्ये नावारुपाला आलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सैदापूर ग्रामस्थ आणि देवस्थान समिती प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने लोकप्रतिनिधी अथवा पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे जुने सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जायचे कसे? पुणेहून 165 किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर कराड हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. कराड शहरातून मसूर गावाकडे जाताना नगर परिषदेच्या हद्दीला लागून विद्यानगर अर्थात सैदापूर गाव आहे. कराडपासून सैदापूरचे अंतर अवघे सहा किमी आहे. या सैदापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. पावकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी कराड आयटीआयचा रस्ता घ्यावा आणि सैदापूर गावात जावे. या गावाच्या कृष्णानदीच्या तीरावरच पावकेश्वर मंदिर आहे. कोल्हापूर-कराड अंतर 70 किमी आहे.
आगाशिव लेणी :
कराड मध्ये आगाशिव नगर ,जखिण वाडी आणि नांदलापुर ह्या भागात बौद्ध विप्पस्नना केंद्र म्हणजे बुद्धकालीन लेणी आहेत .कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. त्यांना जखीणवाडीची लेणी असेही म्हणतात. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या पावसाळ्यातील मुक्कामासाठी खोदली असावीत. कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी आगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांना ‘आगाशिवची लेणी’ असे म्हटले जाते. आस्ट्रेलियन आर्किओलोजीस्ट आपल्या The hidden ancient history of india ह्या पुस्तकात पुस्तकाचा संदर्भ देऊन सांगतो की कराड परिसरात एकुण 108 बौद्ध लेणी आहेत . खरं तर आगाशिवचा डोंगर पुर्ण बुद्ध लेण्यांनी भरलेला दिसून येतो.मात्र सध्याच्या अवस्थेत या परिसरात एकूण १०१ लेणी असावीत. त्यापैकी ६४ लेणी बघण्यासारखी आहेत. येथे लेण्यांचे तीन समूह आहेत. पहिल्या समूहात २६ लेणी असून, यापैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्यांत चैत्यगृहे असून, त्यामध्ये स्तूप आहेत. सहा क्रमांकाच्या लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नक्षीकाम असलेले धम्मचक्र, तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे. बाकी २२ लेणी विहार प्रकारातील आहेत. २२व्या क्रमांकाचे लेणे सगळ्यात मोठे असून, विहार प्रकारात आहे.
डोंगराच्या दोन रांगांमधील दरीत दुसरा लेणीसमूह असून, यास भैरवदरा लेणी (Bhairav Caves) असे संबोधले जाते. येथे १२ लेणी असून, फक्त चारच दिसून येतात. यात तीन विहार व एक चैत्य लेणे दिसून येते. पाण्याचे एक खोदलेले टाकेही दिसून येते.
जखीणवाडीची लेणी
या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्रात रस असलेले अनेक लोक येतात व लेण्यांविषयी माहिती मिळवतात.देशातील बौद्ध लेण्यांकडे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने अतिक्रमणे हटवून या लेण्यांना संरक्षण द्यावे. बौद्ध लेण्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यानंतर या परिसरात पायाभूत सुविधा देण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जखीनवाडी येथे सध्या एकूण ६३ लेण्या आहेत . काही अभ्यासकांच्या मते तेथे एकूण 108 लेण्या होत्या.परंतु आता केवळ 63 किंवा 64 लेण्यांच अस्तित्वात आहेत. बाकीच्या लेण्या या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. एकाच डोंगरांमध्ये एवढया मोठ्या संख्येने बौद्ध लेण्या असण्याचे मुंबई जवळील कण्हेरी नंतर हे महाराष्ट्रातील दुसरे ठिकाण आहे. या सर्व लेण्या हीनयान पंथीय असून त्याचे खोदकाम पहिल्या ते चौथ्या शतकातील आहे .या ६३ लेण्या तीन समूहामध्ये विभागलेल्या आहेत. पहिला समूह हा आगाशिव डोंगराच्या दक्षिणेला असून त्यामध्ये २६ लेण्या आहेत . या लेणीसामुहाकडे जाण्यासाठी जखीनवाडी गावातून जावे लागते. जखीनवाडी गावातून लेणीकडे जाण्यासाठी पुरातत्व विभागाने नुकत्याच पायरया बसविलेल्या आहेत .
पायऱ्यांनी अंदाजे २० ते ३० मिनिटे चढाई केल्यानंतर समोर लेण्या दिसतात . या लेणीसमुहामधील २६ लेण्यांपैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्या या चैत्यगृहे असून त्यामध्ये स्तूप आहेत तर बाकीच्या २२ लेण्या विहारे आहेत . ६ क्रमाकाच्या लेणी बाहेर प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला धम्म चक्र तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे आहे . सिंहस्तंभ आणि धम्मचक्रावरील नक्षीकाम अप्रतिम आहे . २२ क्रमांकाची लेणी हि सर्वात मोठी आहे.
दुसरा लेणीसमुह हा आगाशिव डोंगराच्या दोन रांगांमधील दरीत आहे. त्या दरीस भैरवदरा ( Bhairav Caves) असे स्थानिक नाव आहे. पहिला समूह पाहिल्यावर डोंगराच्या पश्चिमेकडे पाहिल्यास एक छोटे देऊळ दिसते त्या देवळाच्या दिशेने अंदाजे २० ते ३० मिनिटे चालत गेल्यास एक विहीर आणि एक मठ दिसतो . डोंगरावरील देऊळ आणि मठ हे आताचे बांधकाम आहे. मठाच्या उत्तरेकडून झाडांमधून एक छोटीशी पायवाट भैरव दर्यातील लेणीमध्ये उतरते.
अंदाजे १० ते १५ मिनिटे पायवाटेने उतरल्यास समोरच पुरातत्व खात्याचे निळ्या रंगाचे पत्र्याचे शेड दिसते . व डाव्या बाजूला चार लेणी दिसतात . त्यातील एक लेणी हे चैत्यगृह आहे. तर बाकीच्या लेण्या या विहारे आहेत . काही अभ्यासकांच्या मते येथे १२ लेण्या आहेत परंतु मी भेट दिल्यावर येथे फक्त चारच लेण्या दिसल्या . त्यातील दोन लेण्या या झुडूपामध्ये लपलेल्या होत्या . बाकीच्या लेन्या ही कदाचित झुडूपामध्ये लपलेल्या असण्याची शक्यता आहे . येथील चैत्यागृहाच्या बाहेर पाण्याचे टाके असून त्यातील पाणी अत्यंत स्वच्छ आणि गोड आहे .
तिसरा लेणीसमूह ( Agashivnagar Caves) हा आगाशिव डोंगराच्या उत्तरेला आहे . भैरव दर्यातील लेण्या बघून परत मठाकडे आल्यानंतर डोंगराच्या पश्चिमेला असलेल्या छोट्या देवळाकडे गेल्यास आणखी एक पायवाट दिसते . ती पायवाट डोंगराच्या माथ्या वरून पश्चिमेकडून पूर्वेकडे सरळ सरळ या तिसर्या लेणीसमुहाकडे जाते . अंदाजे ३० ते ४० मिनटे डोंगर सपाटी वरून चालल्यानंतर डोंगराच्या उत्तरेला हा तिसरा लेणी समुह आहे . या लेणी समूहाकडे जाण्यासाठी कराड ढेबेवाडी रोडवरील आगाशिव नगर मधून हि पायर्या आहेत. परंतु तीनही लेणी समूह एकत्र पहायचे असतील तर प्रथम जखीनवाडी गावातून पहिला लेणी समूह नंतर भैरव दर्यातील लेणी समूह व नंतर तसेच चालत चालत आगाशिव नगर मधील लेणी समूह हा ट्रेक जास्त सोयीस्कर आहे.
आगाशिव नगर लेणी समूहामध्ये १४ लेण्या असून त्यामध्ये दोन चैत्यगृहे आहेत. आणि बाकीची विहारे आहेत . आगाशिव नगर लेण्या पाहून १० ते १५ मिनिटामध्ये पायर्यांनी तुम्ही आगाशिव नगर मध्ये उतरू शकता . परंतु स्वताचे वाहन घेऊन जाणार असाल तर जखीनवाडी गावातून पहिला लेणी समूह आणि भैरव दर्यातील लेणी समूह पाहिल्यानंतर,वाहन चालकास परत पाठवून त्यास आगाशिवनगर मध्ये उरलेल्या लोकांना घ्यायला बोलविल्यास सर्वात जास्त सोयीस्कर आहे . नाहीतर आगाशिवनगर लेणी पाहून परत मठ पहिला लेणी समूह आणि जखीनवाडी असा उलटा ट्रेक करावा लागेल . कराड ढेबेवाडी रोडवरच आगाशिवनगर पासून ३ किलोमीटर वर चचेगाव हे गाव आहे या गावातून आगाशिव डोंगराकडे गेल्यास आणखी एक चार लेण्याचा समूह आहे . त्यामध्ये एक चैत्यगृह आहे तर बाकी तीन विहारे आहेत.आगाशिवनगर येथील लेणी क्रमांक ४७ मध्ये सापडलेला लेख त्याचे मराठी मध्ये भाषांतर ===> " गोपाल याचा मुलगा संघमित्र याने लेण्यांचे धम्म दान दिले " .आता हा गोपाळ व्यापारी असू शकतो कदाचित राजा सुद्धा असू शकतो .
फोटो सौजन्य :मनोज ओव्हाळ पुणे, आणि महेश अशोक शिंदे, कराडकर
कापील येथे मलकापूरनजीक गोलघुमट ही अतिप्राचीन वास्तू आहे. आदिलशाहीच्या राजवटीत कऱ्हाडनजीक सैनिकांचे तळ असताना आदिलशहाच्या राज्यातील प्रमुखांनी सैन्याबरोबरचा कुटुंबकबिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी मलिकापूर म्हणजेच आताच्या मलकापूरनजीक वस्ती केली होती. कापीलच्या हद्दीत सैन्याच्या कुटुंबीयांची व्यवस्था करण्यासाठी निवासाची व पाण्याची सोय करण्यात आली. त्यामधीलच गोलघुमट ही वास्तू आहे. तेथून काही अंतरावर चौकोनी पाण्याची विहीर आहे. प्राचीन काळातील अद्भुत कलाकृतीच्या नमुनेदार अशा दोन्हीही वास्तू आहेत. गोलघुमट व विहिरीची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. घुमट परिसरात मोठी झाडे वाढली आहेत, तर विहिरीची पडझड सुरू आहे.
संदर्भः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख
३) श्री. आशुतोष बापट,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण
Type: Hill forts
Area: Satara
Grade: Easy
Base Village: Nandgiri (Dhumalvadi), 120 Kms from Pune
Time to climb: 1-1.15 Hours
Best time to visit: Monsoon
Time visited: June 2011
Way to reach from Pune: Travel to Satara and take left to Satara Road (Padali) and reach dhumalvadi.
History as per on web: Kalyangad AKA Nandgiri fort was built by
king Bhoj-II of Shilahar dynasty between 1178 to 1209. The Shilahar
Dynasty was follower of Jainism. This dynasty ruled all over the south
Maharashtra and North Karanatka between 11th to 13th Centuries. After
decline of Shilahar Dynasty, the Nandgiri fort was captured by Adilshah
of Bijapur. The fort was conquered back by Chhatrapati Shivaji Maharaj
in 1673 A.D. As this fort was very difficult to climb, Chhatrapati
Shivaji Maharaj's treasury was kept on this fort. After Shivaji, the
administration of Kalyangad went into the hands of Pratinidhis and later
fort was taken over by Peshwa. In 1818 the fort came under British
control.
Monsoon
had arrived early and had been there for a week so we decided to sart
the trekking season. Started early at 6.30 AM and after having Vadpav at
Ramprasad @ shirval our usal stop over we proceededto
Bhuinj. Now we wanted to visit a historic temple in Kikali and we
exitsed NH4 from Bhuinj for Nikamwadi. On the way we stopped for
directions and old man offered us to sho till Nandgiri. he mentioned
that Kikali temple was being reconstructed.
The
fort looks easy from the bottom but as you start climbing you get feel
of steep slopes. All over the way Arrows have been marked. On the way is
a cave pond with carved pillars supporting the roof. A neat staircase
leads to the main gate facing north.
The path, made up of steps, leads us to the door facing east.
On entering the fort by this path we come across the temple of Lord Hanuman.
There
is a ruined temple of Shree Ganesh and a big lake ahead on the left. On
the right side you would see few windmills rotating with swish of wind.
On A few steps ahead are the remnants of palaces. After going straight
from this way for 10 minutes we reach to eastern part of the fort. There
a huge Banyan tree which is also seen from the base of fort/far away.
Few
minutes after this point you can see beautiful lush green
sourrouindings and few forts in this region- Jaranda, Ajinkyatara,
Chandan, Vandan, Morya and Vairatgad if the skies are clear.
We could locate Jaranda easily. I immediately made up a point to visit Jaranda later this year.
It takes approximately half an hour to watch the top of the fort.
Just
after the first gate on the left is a steep footpath descends into a
hollow of about forty-fifty feet deep. This is an entrance to a huge
pitch dark cavern.
You will get few minutes to adjust your eyesight as nothing can be seen except a a faint flicker of diya far far away.
There
are railings inside the cave which is usually filled with water.
Sometimes it is said that the water is knee deep or could be upto even
waist deep in monsoosns and you have to walk stooping.
The cave is said to be around 30m deep.At the end
of the cave you see status of Lord Dutta and on right hand side is very
ancient statue of Lord Parshavnath in a sitting posture. Since it was
just beginning of monsoon there was absolutely no water in the cave near
the railings but on the right side there seemed to deep water..
It takes approximately half an hour to watch the top of the fort
and maybe half an hour for the cave. We came down in 20-25 minutes and
it started raining heavily. We proceeded to our next destination Bara
Mota chi Vihir.
Type: Historic well
Area: Satara
Base Village: Limb, 20 Kms from Satara
Time visited: June 2011
Way
to reach from Pune: Travel to Satara. Few kms before satara after
Satara College on Engineering and Management on the right, take left to
Nagewadi. Proceed to Limb village. The road is muddy few kms after Limb.
After visiting Nandgiri fort we proceeded to Limb village off Nagewadi.
Built
in 1646 by Sou Virubhai Bhosanle this historic well was said to provide
water a huge amrai (Mango plantation) with its 12 moats. From the top
all you see is few tiny walls and water channels.
But
the as you approach the staircase you are struck by the grand entrance
arch below the ground level. This arch leads to a lower plinth for
fetching water. There are 2 beautiful carved flowers on either side of
arch and gallery above.
The
gallery is open both sides one inside the well and towards main
entrance is actually a small palace complete with a place for throne.
A chor darwaja leads to this gallery.
The well is 110 feet deep, Octagonal in shape and around 50 feet
in diameter. The holes a clear indication fwhere moats were sued for
pulling water.
After a hearty Thalpit @ Virangula again our usual fastfood joint we proceeded back to pune. We reached back by around 4.30 pm.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.