Thursday, July 1, 2021

मुंबईची सफर

 

मुंबई दर्शन

मे महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरु झाल्या की वेध लागतात ते पर्यटनाचे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे अशी आहेत की जेथे जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मुंबईतल्या मुंबईत फिरणे अधिक सोईचे होते. अशा मुंबई स्थित पर्यटनस्थळांची माहिती मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे ती येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)
छत्रपती शिवाटी टर्मिनस इमारत सुंदरतेचा नमुना असून आज जगामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या एक सुंदर स्थानक म्हणून गणले गेले आहे.

सन 1888 मध्ये ब्रिटीशांनी बांधले असून व्यवस्थित बसविलेली तावदाने आणि भिंतीवरील नक्षीकामासमवेत तिच्या दर्शनी भागावर अत्युत्तम भुषणकला कोरण्यात आली आहे. फ्रेडरिक विल्यम्स स्टीवन्स या वास्तुशास्त्रकाराने या स्थानकाची रचना रु.16.14 लाख इतके शुल्क घेवून केली आणि ही इमारत पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली.

छ.शि.ट.च्या कळसावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा असल्यामुळे राणी व्हिक्टारिया राजवटीच्या स्मरणार्थ या स्थानकास ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नाव देण्यात आले होते.

मुंबईमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांकरिता हे फार महत्त्वाचे स्थानक आहे. हे भारतातील एक सर्वात व्यस्त स्थानक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) 
महात्मा ज्योतिबा फुले मंडई किंवा क्रॉफर्ड मार्केट हे नाव बाँम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले. शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या जुन्या ब्रिटीश भागात स्थित असलेली मंडई त्याच्या उंच घड्याळ टॉवर आणि घुमटाने क्षितिजालाही घाबरविते. ही मंडई 1869 मध्ये पूर्ण झाली आणि सर कवासजी जहांगीर यांनी या शहरास ही भेट दिली. लॉकवुड किपलींग यांनी बाहेरील भिंत आणि दगडांचे कारंजे यांची रचना केली होती.

फ्लोरा फाऊंटन 

फ्लोरा फाऊंटन जुन्या चर्चगेटच्या बॉम्बे फोर्टजवळ उभे असून आता तेथे मोठे रस्ते असून त्यास हुतात्मा चौक असे म्हटले जाते. बाँम्बेचे माजी राज्यपाल सर बार्टले फ्रेर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले असून नंतर ग्रीक देवता फ्लोराचे नाव देण्यात आले.

जहांगीर कला दालन 

काळाघोडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाजवळ स्थित असून हे दालन मुंबईच्या कलाकारांकरिता समकालीन कला दाखविते.  हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून के.के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या ईच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी स्थापना केली होती. ही अवाढव्य संस्था भारतीय कलेस पुनरुज्जीवन प्राप्त करून देवू शकते असा या ठिकाणाचा इतिहास.

गेटवे ऑफ इंडिया 
भारताचे प्रवेशद्वार हे उल्लेखनीय चिरकालीन स्मारक असून त्याची देखील जॉर्ज विटेल यांनी रचना केली आहे.

एलिफंटा लेणी 

एलिफंटा लेणी मुंबईमधील मुंबईच्या दुसऱ्‍या किनाऱ्‍यावर वसलेली आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तु ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी असंख्य स्थानिक आणि परकीय पर्यटक भेट देत असतात. पोर्तुगीजांनी या लेणीस घारापुरी ऐवजी ‘एलिफंटा’ असे आधुनिक नाव दिले. एलिफंटातील त्रिमुर्ती शंकराचे तीन तोंड ब्रम्ह, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडविते. येथे अन्य शिल्प नटराज आणि सदाशिव यांच्या उठावांचे आणि अर्धनारीश्वराच्या भव्य नक्षीकामाचे दर्शन घडविते.

मणी भवन
साधं आणि सुंदर संग्रहालय, महात्मा गांधीनी 1917 ते 1934 मुंबईस भेट दिली त्यावेळेस गांधीजी येथे राहत असत. मणीभवन येथे गांधीजींची खोली आणि ते वापरत असलेल्या वस्तुंसहित पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवल्या असून हे संग्रहालय लेबरनम मार्ग, ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ स्थित आहे. ही इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील ह्या कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

ही इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील ह्या कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता. सदर इमारत 1955 मध्ये गांधी स्मारक निधीने गांधींजींचे स्मारक म्हणून परिरक्षणाकरिता ताब्यात घेतली होती.

मरीन ड्राईव्ह 
मरीन ड्राईव्ह हे दक्षिण मुंबईतील किनाऱ्‍यालगत असलेल्या उलट्या ‘सी’ आकाराच्या सहा मार्गाच्या काँक्रीट रस्त्याने 3 कि.मी. इतक्या भागात विस्तारले आहे. नरीमन पॉईंट ते मलबार हिल असा जोडणारा मरीन ड्राईव्ह पश्चिम-दक्षिण-पश्चिम बाजूने दलदलीच्या जमिनीवर बांधण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्हचे (नेताजी सुभाषचंद्र मार्ग म्हणूनही ओळखले जाते) मुख्य आकर्षण म्हणजे पाने असलेली ताडाची झाडे एका ओळीने असल्यामुळे मोहून टाकतात. एका बाजूला सन 1920 आणि 1930 मध्ये बांधलेल्या डेको कलेच्या इमारतींचा नमुना आणि दुसरीकडे अरबी समुद्र यामुळे रस्त्यास वास्तुशिल्पाची जोड येते. मरीन ड्राईव्ह हे मुंबई मॅरेथॉन, लडाऊ विमानांचा हवाई कार्यक्रम यासहित अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणाला रात्रीच्या रस्त्यावरील दिवे हिऱ्यांच्या हाराप्रमाणे दिसतो यामुळे यास ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
पूर्वीचे विज्ञान संस्थेचे कवासजी जहांगीर सभागृहाचे चांगल्या भारतीय समकालीन कला प्रदर्शित करता यावे यासाठी चार मजली प्रदर्शन सभागृहात रुपांतरीत करण्यात आले.

सन 1911 मध्ये जॉर्ज राजे-पाच आणि राणी मेरी यांच्या भारतास भेट दिल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.
या भागामध्ये एलिफंटा बेट आणि बंदराच्या आसपासच्या अन्य समुद्रकिनाऱ्‍यांवर जाण्याकरिता बोट सेवादेखील आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर असे जुने आणि नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे.

मलबार टेकडी
मलबार टेकडी, अतिशय लहान टेकडीवर वाळकेश्वर मंदिर असून त्यांचे संस्थापक राजे सिलहारा होते. पोर्तुगीजांनी मंदिर उध्वस्त केले होते परंतु रामा कामत यांनी 1715 मध्ये ते पुन्हा बांधले. 50 मीटर (80 फूट) उंच मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे.

मलबार टेकडी हे शहरातील जास्त गर्दीचा निवासी भाग असून उद्योग जगतातील आणि करमणूक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत.

राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि वर्षा बंगला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थानही येथे आहे.

चौपाटी समुद्रकिनारा
मुंबईचे नागरिक आणि पर्यटक येथे वारंवार जात असल्यामुळे कदाचित चौपाटी समुद्रकिनार हा मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. मलबार टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे. तरुण जोडप्यांपासून कुटुंबापर्यंत मजा लुटण्यासाठी येतात तसेच आपली सायंकाळची वेळ घालविण्यासाठी वरिष्ठ नागरिक येत असतात तसेच या चौपाटीवर शुद्ध हवेमध्ये श्वास घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकाला आवडते.

कमला नेहरु उद्यान 
मलबार टेकडीच्या पायथ्याशी वसले असून मुख्यतः बालकांसाठी असलेल्या उद्यानास भारताच्या प्रथम पंतप्रधानांच्या पत्नीचे नाव देण्यात आले आहे .1952 मध्ये सुरु झालेले उद्यान मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीचा चहूबाजूचा नजारा दाखवितो.

तारापोरवाला मत्स्यालय
तारापोरवाला मत्सालय हे शहरातील एकमेव मत्स्यालय आहे. सन 1951 मध्ये बांधकाम झालेल्या या वास्तुस एकूण रु. 8,00,000/- इतका खर्च आला. यामध्ये समुद्र आणि तलावातील पाण्यातील मासे पहावयास मिळतात. हे मत्स्यालय प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह येथे स्थित आहे. येथे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ माशांसहित समुद्र आणि गोड्या पाण्याच्या माशांच्या 100 प्रजाती आहेत. येथील आकर्षणामध्ये शार्क, कासव आणि मोऱ्‍या यांचा समावेश होता.

सहा दशके जुने असलेल्या मुंबईतील या मत्स्यालयाचे अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे. नुतनीकरणासाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर मागील वर्षी ३ मार्च २०१५ रोजी हे मत्स्यालय पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ, विलोभनीय, शोभिवंत मासे येथे पहावयास मिळतात.

फोर्ट भागातील व्हिक्टोरियन इमारती
फाऊंटन वा फोर्ट भागामधील पाहण्यासारख्या अन्य इमारती म्हणजे भव्य राजाभाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, जुने सचिवालय आणि एका शेवटच्या भागात शास्त्रीय संस्था यासहित मुंबई विद्यापीठ इमारत.

त्याजवळ सेंट थॉमस कॅथेड्रल, दि एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे वा टाऊन हॉल, पोलिस महासंचालकांचे कार्यालय, मुख्य पोस्ट कार्यालय आणि थॉमस कुक इमारत स्थित आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही चर्चगेट स्थानकापासून जवळपास समोरील पदपथावर आहे. ही इमारत म्हणजे गोठीक आणि इंडो-सेरासेनिक शैलीचा उत्तम नमुना आहे.

बहुसंख्य इमारतीत रात्रीची रोषणाई असते. ही ठिकाणे पाहण्यासाठी एमटीडीसीची छतविरहीत बसमधून आस्वाद घेणे विलक्षण अनुभव असतो.

मुंबईतील प्राणीसंग्रहालय 
प्राणीसंग्रहालय आणि उद्यान मुंबईच्या मध्यभागी भायखळा येथे स्थित असून त्यास राणी जिजाबाई उद्यान किंवा राणीबाग म्हणून ओळखले जाते. मुलतः व्हिक्टोरिया उद्यान म्हणून संबोधले जाणारे सन 1861 मध्ये बनविले गेले होते. उद्यानामध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयही स्थित असून औद्योगिक आणि शेतीच्या उद्देशाकरिता बनविले होते.

हाजी अली 
हाजी अली दर्गा वरळी भागाच्या मध्यभागी असून हे पवित्र स्थान मुस्लीमांचे संत जे मक्का येथे यात्रेस जात असताना मृत्युमुखी पडले त्यांच्या आठवणीस्मरणार्थ आहे. एक श्रद्धा अशी आहे की दागिन्यांचा लहान डबा तरंगत होता आणि तो या समुद्रामधील दगडांच्या बिछान्यावर आराम करण्यासाठी जेथे आला तेथेच किनाऱ्‍यापासून 500 वार लहान दगडी बेटावर भाविकांनी दर्गा बांधली. शहराच्या महालक्ष्मीच्या सीमेस अरुंद दगडी बांधाने हे बेट जोडते. हा दगडी मर्गास कुंपण नसून भरती असताना समुद्राच्या पाणी या बांधावर आपटते. म्हणून दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. या दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूने समुद्र हा सहलीच्या यात्रेचा विलोभणीय क्षण आहे.

महालक्ष्मी मंदिर 
भुलाभाई देसाई मार्गावर स्थित असलेले हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर संपत्तीची देवता महालक्ष्मीकरिता बांधले आहे. साधारण 1785 मध्ये बांधलेले ह्या मंदिराचा इतिहास हॉर्नबाय वेलार्डच्या इमारतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी वेलार्डची भिंत बांधत असताना दोन वेळा भिंतीचा काही भाग कोसळला त्यावेळेस प्रमुख अभियंता पाठारे प्रभु यांना वरळीजवळील समुद्रामध्ये लक्ष्मीच्या मुर्तीचे स्वप्न पडले. शोध घेऊन मूर्ती सापडल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर वेलार्डचे काम कोणतीही अडचण न येता पूर्ण करता येवू शकले.

सिध्दीविनायक मंदिर

प्रभादेवी येथे स्थित असलेले हे गणपती देवाच्या स्मरणार्थ प्रमुख मंदिर असून 200 वर्षापूर्वीच्या जुन्या मंदिराच्या जागेवर पुनर्बांधणी करण्यात आली आहे. काळ्या दगडाने बांधलेल्या या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या असून अर्धा फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे.

या मूर्तीचे अपूर्व वैशिष्ट्य असे की, त्याची सोंड जव्या बाजूस वळली असून गणपतीच्या मूर्तीमध्ये सहसा आढळत नाही. दर्शन व पूजेचा महत्‍त्वाचा वार मंगळवार असतो परंतु या मंदिरामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

नेहरु तारांगण 

लंबवर्तुळाकार नेहरु केंद्राची उंच कणसाच्या बुरखुंडासारखी दिसणारी इमारत महालक्ष्मीच्या उत्तरेकडे दिसते. येथे तारांगणात प्रचार केंद्र आणि संगीत जलसा-नि-चित्रपट सभागृह आहे. हे तारांगण पृथ्वीवरुन कोणत्याही ठिकाणाहून भूत, वर्तमान वा भविष्यामधील कोणत्याही वेळी आकाशाचे प्रतिबिंब दर्शविते.

नेहरु शास्त्रीय केंद्र
नेहरु शास्त्रीय केंद्र हे साठच्या दशकामध्ये प्रथम शास्त्रीय व तंत्रज्ञान संग्रहालय म्हणून नावारुपास आले त्यानंतर 8 एकरवर पसरलेल्या शास्त्रीय पार्क जीवनाच्या मालमत्तांसंबंधीत, रेल्वे इंजिन, ट्रामगाड्या, अतिजलद विमान आणि वाफेवरील लॉरी यासारख्या गोष्टींचे प्रदर्शन समाविष्ट असलेले भारतातील सर्वात मोठे क्रियाशील शास्त्रीय केंद्र आहे.

प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय
व्हिक्टोरियन वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे राजे जॉर्ज-पाचवे मुंबई भेटीस आले त्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. त्याची संकल्पना जॉर्ज विटेट यांनी केली होती आणि ते सन 1923 मध्ये पूर्ण करण्यात आले.

हे भारतातील खरोखरच उत्तम संग्रहालय असून त्यामध्ये भारतातील प्राचीन संस्कृसहित विविध युगातील धनसंग्रह, सत्यकला, रंगीत चित्र आणि शिल्प येथे आहेत.

-विलास सागवेकर, 
उपसंपादक

मुंबईतील ‘माईलस्टोन्स..’

मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन 'माईलस्टोन्स'ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे.

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्षे वयाचे इतिहासपुरुष अर्थात माईलस्टोन्स असे एकूण तेरा-चौदा माईलस्टोन होते व आजमितीस त्यातील केवळ सहा-सातच शिल्लक असून बाकीचे काळाच्या (की रस्त्याच्या?) उदरात गडप झाले आहेत अशी माहिती बऱ्याच ठिकाणी मिळते.. मी यापैकी काही 'माईलस्टोन'चा माग काढला व त्यांचं प्रत्यक्ष 'दर्शन' घेऊन आलो.. त्या 'माईलस्टोन्स'चे फोटो व लोकेशन आपल्याशी शेअर करतोय..!

हे सर्व माईलस्टोन्स मुळात सहा-सात फूट उंच होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो व ते तसे असावेत असा अंदाज आपण सहज बांधू शकतो कारण रस्त्यांवर मोटारी अवतरण्यापूर्वी सर्व प्रवास बैल वा घोडागाडीतून होत होता व बैलगाडी किंवा घोडागाडीची उंची जास्त असल्यामुळे त्यात बसलेल्या सवारीला किती अंतर झाले किंवा राहिले हे सहज दिसण्यासाठी तेवढी उंची गरजेचीच होती. हे माईलस्टोन्स आयताकृती उभट चौकोनी दगडाचे असून त्यावर रोमन अक्षरं कोरलेली आहेत व टॉप पिरॅमिडच्या आकाराचा आहे हे सोबतच्या फोटोंवरून दिसेल.

या माईलस्टोन्सवरील सर्व अंतरं 'सेंट थॉमस चर्च' पासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' म्हणजे आताच्या फोर्ट मधील हॉर्निमन सर्कलच्या पश्चिम दिशेस आहे, ते..! हुतात्मा चौकातून पूर्व दिशेस 'वीर नरिमन रोड' नांवाचा जो सरळ रस्ता 'अकबर अलीज' वरून हॉर्निमन सर्कलला जातो, तो रस्ता थेट या सेंट थॉमस चर्चलाच पोहोचतो. हे चर्च १६७६ साली बांधायला घेतलं व जवळपास चाळीस वर्षांनी म्हणजे १७१८ मध्ये पूर्ण होऊन प्रार्थनेसाठी खुलं करण्यात आलं अशी माहिती विकीपेडिया देतो.. या चर्चमुळेच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील सुरूवातीच्या स्टेशनचं नांव 'चर्चगेट' ठेवण्यात आलं आहे...

चर्चचा इतिहास थोडक्यात कथन करण्याचं कारण, मुंबईतल्या मैलांच्या दगडावरील अंतर या चर्चपासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' हे '0'- झीरोमाईल - मानलं गेलं होतं.. मी पाहिलेल्या सर्व दगडांवर '....FROM ST. THOMAS'S CHURCH' असा स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो.. चर्च ७१८ मध्ये तयार झालं असं लक्षात घेतलं, तर अंतर दर्शविणारे हे मैलांचे दगड सन १७१८ च्या नंतर बसवले गेले असावेत असा निष्कर्ष काढावा लागेल, म्हणजे त्याचं आजचं वय ३०० वर्ष व आसपास असल्याचं लक्षात येतं..!!

मी बघितलेला पहिला माईलस्टोन चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिमेस, ऑर्थर रोडच्या नाक्यावर आहे.. लालबाग मार्केटकडून जो पुलरस्ता चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिम दिशेस येतो व नंतर डावीकडे वळून भायखळ्याच्या दिशेने जातो, अगदी त्या वळणावरच डावीकडे हा 'माईलस्टोन' उभा आहे. हा 'माईलस्टोन' सेंट थॉमस चर्च' पासूनच 'IV MILES' – चार मैल - अंतर दर्शवितो.. या दगडावर कोरलेली 'IV MILES FROM ST. THOMAS'S CHURCH' ही अक्षरं जमिनीच्या पोटात लुप्त होण्याच्या मार्गावर असली तरी अजूनही स्पष्ट वाचता येतात..

मी पाहिलेला दुसरा माईलस्टोन सायनच्या पूर्वेस 'तामिळ संघम' नावाची प्रसिद्ध संस्था ज्या गल्लीत उभी आहे, त्याच गल्लीत उभा आहे. मुंबईहून सायनच्या दिशेने जाताना, उजव्या बाजूचे 'गांधी मार्केट' गेलं की लगेच पुढे काही अंतरावर 'तामिळ संघम'ची इमारत लागते.. ही इमारत, बाहेरचा मेन रोड व मेन रोडला समांतर, पण आतून जाणाऱ्या गल्लीच्या टोकाशी उभी आहे.. ही आतून जाणारी गल्ली पुन्हा पुढे मेन रोडला मिळते त्या गल्लीत हा माईलस्टोन उभा आहे.. हा असा मेन रोड पासून आत उभा का, या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही.. या दगडावर 'VIII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – आठ मैल - अशी अक्षरं कोरली आहेत.. कोणी स्थानिकाने या दगडास पिवळा रंग दिला आहे तो बहुतेक त्यावरील 'चर्च' या अक्षरांमुळे त्याची भाविक वृत्ती जागृत झाल्यामुळे असावा.. या दगडावरील सर्व डिटेल्स आजही स्वच्छ वाचता येतात.. हा दगड फुटपाथच्या पोटात समाधी घेण्याच्या तयारीत तिरका उभा आहे..!!

तिसरा माईलस्टोन मला भेटला तो दादरच्या पूर्वेस असलेल्या 'चित्रा सिनेमा'च्या अगदी समोरच्या बाजूस असलेल्या गुरूद्वारा इमारतीच्या दक्षिण टोकाच्या फुटपाथवर..! ह्यावर 'VI MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सहा मैल- अशी अक्षरे कोरली आहेत.

मला भेटलेला चौथा माईलस्टोन दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ असलेल्या गोल देवळापासून पोर्तुगीज चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. नेमकं सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी या परिसरातल्या ज्या बस स्टॉप जवळ बॉम्ब स्फोट झाला होता, त्या बस स्टॉपच्या शेजारीच हा दगड दिसेल. हा मैलाचा दगड 'VII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सात मैल - अंतर दर्शवतो.

असे आणखी दोन ते तीन माईलस्टोन्स मुंबईतील काळबादेवी, गोवालिया टँक आणि ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलपाशी असल्याचा उल्लेख नेटवर सापडतो. परंतु मी ते पाहिले नसल्यामुळे त्यांची माहिती इथे दिलेली नाही.

आता शिल्लक असलेले व मी पाहिलेले मैलाचे दगड आता जेमतेम दोन-अडीच फूट जमिनीवर आहेत. हे सर्वच माईलस्टोन्स निर्वासितासारखे असहाय्य होऊन फुटपाथवर दुर्लक्षित आहेत. दादरच्या गोल देवळाजवळच्या माईलस्टोनची अवस्था फारच बिकट आहे. केवळ एक फुटभर शिल्लक असलेल्या या माईलस्टोनवरील केवळ ‘VII’ एवढीच अक्षरे वाचता येतात, बाकी सर्व फुटपाथने गिळून टाकलंय. हे सर्व मैलाचे दगड ‘ग्रेड वन’च्या ‘हेरीटेज’ प्रकारचे असावेत. हा आपला इतिहास आहे, वारसा आहे..! यांची जपणूक करून ते भावी पिढ्यांच्या माहितीसाठी सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. ३०० च्या दरम्यान वय असणाऱ्या या पुराणपुरुषांना वृद्धाश्रमात (म्युझियममध्ये) न हलवता, आहे त्याच जागी त्यांना त्यांच्या मुळच्या स्वरुपात आणून, शेजारी त्यांची थोडक्यात माहिती देणारी पाटी लावल्यास अधिक सोईस्कर होईल.

- गणेश साळुंखे
9321811091





मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले.. (भाग १)

काळा घोडा

दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापित, पुतळ्यांत 'काळा घोडा' पुतळ्याचा अव्वल नंबर लागेल. अव्वल याचसाठी की पूर्वी इथं असलेल्या या पुतळ्याविषयी बऱ्याच मुंबैकरांना ऐकून का होईना पण माहिती आहे.

सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारात असलेल्या चौक व परिसराला 'काळा घोडा' म्हणतात.. हा परिसर मुंबईचा 'आर्ट अॅण्ड कल्चर डिस्ट्रीक्ट' म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातील 'समोवार' रेस्टॉरन्ट (आता बंद), गॅलरीच्या समोरचं ऱ्हिदम हाऊस (हे ही आता बंद), इथून हाकेच्या अंतरावर असलेली नॅशनल आर्ट गॅलरी, भव्य म्युझियम आणि कला, संस्कृती, चित्रपट, नाटक आणि साहित्य यांवरील उत्तमोत्तम कार्यक्रम सातत्याने आयोजित करणारी ख्यातनाम जर्मन संस्था 'मॅक्समुल्लर भवन' अशासारख्या मातब्बर कलाकेंद्रांनी वेढलेला हा सारा परिसर..! हा सर्व परिसर जरी 'मुंबई'च्या कला क्षेत्रातील घडामोडीचा आयना म्हटला जात असला तरी तो प्रतिनिधित्व करतो ते मुख्यत: दक्षिण मुंबईतल्या 'एलीट क्लास'चं..! ही मुंबई ‘My Mumbai’ वाल्यांची..’ ‘माय मुंबई’ वाले त्या तिथे, मेट्रो पलीकडे आणि उपनगरांत..! मेट्रो सिनेमा पलिकडील सामान्य मुंबईकरांचा तसा या संस्थांशी वा या परिसराशी (अस्तंगत झालेलं ऱ्हिदम हाऊस वगळता) नोकरी व्यतिरिक्त फारसा संबंध येत नाही. नाही म्हणायला गेल्या काही वर्षापासून इथे भरत असलेला 'काळा घोडा फेस्टीवल' आता उपनगरातही चांगलाच परकोलेट होऊ लागलाय.. 'एलीट क्लास' आता उपनगरातही विस्तारायला लागलाय असा त्याचा अर्थ काढता येईल.

असो. जहांगीरच्या अगदी दारात, डेव्हिड ससून लायब्ररीच्या समोर सध्या जो पार्कींग लॉट आहे, तिथे हा 'काळा घोडा' त्याच्यावरील स्वारासकट १८७९ च्या मध्यावर उभा राहिला, तो सन १९६५ सालापर्यंत तिथेच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळुहळू ब्रिटीशांच्या सर्व पुतळ्यांची रवानगी गोडावूनमध्ये केली गेली त्यात हा पुतळाही होता.

१८७५ साली इंग्लंडच्या राजाने (तेव्हाच्या भारताच्याही), किंग एडवर्ड सातवा (प्रिन्स ऑफ वेल्स) यांने, मुंबईस भेट दिली व त्याच्या स्मरणार्थ त्याचा हा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. हा पुतळा सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या मुंबईतील श्रीमंत व परोपकारी ज्यू व्यापाऱ्यांने त्या वेळच्या मुंबई शहराला आणि शहरवासियांना भेट दिला होता. खरं तर हा पुतळा सातव्या एडवर्डचा, पण तो त्याच्यामुळे कधीच ओळखला गेला नाही. पुतळा सुरुवातीपासून ओळखला जातो तो त्याच्या घोड्यामुळे !

घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड संपूर्ण लष्करी, फिल्ड मार्शलच्या, गणवेशात असून राजा व त्याच्या बुटापासून केसांपर्यतचे काळ्या दगडात कोरलेले सर्व बारकावे मुद्दाम बघण्यासारखे आहेत. अत्यंत प्रमाणबद्ध असलेल्या आणि काळ्या पत्थरात घडवलेल्या या संपूर्ण शिल्पात घोड्याचं सौष्ठव इतक्या अचूकपणे पकडलय की तो अगदी जिवंत असून कधीही चालायला लागेल असा क्षणभर भास होतो आणि कदाचित म्हणून सातव्या एडवर्डपेक्षाही घोडाच लोकांच्या लक्षात राहिला असावा. कदाचित असंही असेल, की आपल्यावर राज्य करणाऱ्या राजाचं नाव कस घ्यायचं आणि म्हणून त्याचा उल्लेख काळा घोडा असा तेव्हाचे लोक करत असतील. इथं मला माझ्या आजीची आठवण येते. माझी लालबागची आजी आजोबांचा उल्लेख ‘हापिस आलं’, ‘हापिस गेलं’ अशी करायची, तसं असेल किंवा एवढं मोठ कठीण नाव घेण जमतही नसेल त्या काळच्या लोकांना..! ते काही असलं तरी या जोडीतला लोकांच्या लक्षात राहिला तो घोडाच..!

देश विदेशात “बॉम्बे”ची मोस्ट हॅपनिंग प्लेस म्हणून ‘काळा घोडा’ - तो तिथे नसला तरी - अजुनही मशहूर आहे.. नाव कायम असलं तरी घोडा त्याच्यावरील स्वारासकट त्याच्या या जागेवरून गायब आहे. अनेकांना वरील कथा माहितही असेल परंतु नवीन पिढीला ‘काळा घोडा’ म्हणजे नक्की काय हे माहित नसण्याचीच शक्यता आहे..

तर असा हा 'काळा घोडा' सध्या भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात (राणीच्या बागेत) उभा आहे.. उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे तिकीट काढून आपण आत गेलो की डाव्या हाताला अगदी समोरच आपला सुप्रसिद्ध ‘काळा घोडा’ त्याच्या पाठीवर सातव्या एडवर्डला घेऊन दिमाखात उभा आहे.. इतकी वर्ष उलटून गेली तरी त्याचा आणि त्याच्यावरील राजबिंड्या स्वाराचा रूबाब जराही कमी झालेला नाही.. हे संपूर्ण शिल्पच देखण आहे.. आता या इतक्या अप्रतिम शिल्पाला इथे का म्हणून उभं केलं असावं, असा बावळट प्रश्न मला पडला होता. नंतर मनात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश साम्राज्यवाद्यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हलवताना त्याचं ‘सरकारी वर्गीकरण’ केल गेलं असाव.. जे फक्त माणसांचेच पुतळे होते ते अन्य ठिकाणी गेले. हा पुतळा मात्र ‘प्राण्या’ सकट होता आणि म्हणून कदाचित याची रवानगी 'प्राणी' संग्रहालयात करावी असं एखाद्या देसी बाबूच्या मनात आलं असणं शक्य आहे आणि परिणामी घोडा स्वारासकट इथे आला असावा..

जाता जाता –

‘काळा घोडा’ हे सुरेख शिल्प सर अल्बर्ट डेव्हिड ससून यांनी सन १८७९ साली रु. १,२५,०००/-खर्चून बनवून घेतले होते.. घोड्यासहीत स्वाराचे संपूर्ण शिल्प सुमारे १२-१३ फूट उंचआहे.. श्री. मोरेश्वर शिंगणे आणि श्री.बाळकृष्ण आचार्य यांनी सन १८८९ साली लिहिलेल्या 'मुंबईचा वृत्तांत' या पुस्तकात वरील माहिती मिळते..

या पुतळ्याच्या खाली एक चबुतराही होता. या चबुतऱ्यावर किंग एडवर्डच्या भारतातील संस्थानिकांशी झालेल्या मुलाखतीचं दृश्य कोरलेलं होतं असं श्री. शिगणे यांनी लिहून ठेवलंय.. चबुतऱ्यावर कोरलेले भारतीय संस्थानिकांचे चेहेरे तर इतक्या सफाईने कोरले होते की कोणता चेहेरा कोणाचा हे सहज लक्षात यायचं असं शिंगणे म्हणतात.. या चबुतऱ्याचा शोध घ्यायचा मी खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही..!

'काळा घोडा' ही अप्रतीम कलाकृती आणखी काही काळाने काळाच्या उदरात गडप होण्याच्या आत आपण हे शिल्प जरूर बघून घ्यावं..

-गणेश साळुंखे
9321811091
(संदर्भ - मुंबईचा वृत्तांत -सन १८८९-लेखक मोरेश्वर शिंगणे व बाळकृष्ण आचार्य)

मुंबईतील पुतळे : हलवलेले आणि हरवलेले.. (भाग २)

  • पुतळा 'हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया'चा

काळा घोड्यानंतर मूळ जागेवरून हलवलेल्या 'क्विन व्हिक्टोरीया'च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही..

'काळा घोडा' चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो.. हुतात्मा चौकात चर्चगेट स्टेशनच्या दिशेने समोरच 'सीटीओ'ची म्हणजे आपल्या 'तार ऑफीस'ची इमारत आहे. (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या इमारतीत सुरू झालं. कालांतराने १९१०-११ सालात ते सीएसटी शेजारच्या सध्याच्या भव्य इमारतीत नेण्यात आलं). 'तारायंत्र' बंद झालं असलं तरी इमारतीचं ‘सीटीओ’ नांव अद्याप कायम आहे. या इमारतीच्या मागे स्वराज्यात बांधलेली ‘एमटीएनएल’ची इमारत व या इमारतीच्या मागे असलेली 'टाटा टेलीकम्युनिकेशन्स'ची भव्य इमारत व त्यावरचा उंचं टॉवर आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे.. ‘टाटा टेली.’ म्हणजेच पूर्वाश्रमीचं 'व्हिएसएनएल'चं ऑफीस..

तर, हे टाटा टेलिकम्युनिकेशन्सचं ऑफीस ज्या जागी आहे, बरोबर त्याच जागी इंग्लंडची तत्त्कालीन महाराणी 'हर हायनेस व्हिक्टोरीया' हिचा शुभ्र संगमरवरात घडवलेला सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा होता.. मखराची उंची ४०-४२ फूट होती तर सिंहांसनासहीत पुतळ्याची उंची १५-१६ फूट एवढी होती. सबंध मुंबईत त्याकाळी येवढा सुंदर पुतळा दुसरा नव्हता असा उल्लेख श्री.शिंगणे यांच्या पुस्तकात सापडतो (पुतळ्याचा त्याच जागचा जुना फोटो वर दिला आहे)..

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे पुतळे दृष्टीआड करण्याची जी टूम निघाली, त्यात इतर पुतळ्यांप्रमाणे हा पुतळादेखील मूळ जागेवरून हलवून त्याची रवानगी भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये करण्यात आली..

मी नुकताच हा पुतळा पाहून आलो.. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या 'इस्ट लॉन'वर झाडांच्याखाली अगदी उघड्यावर ब्रिटीशांचे सात-आठ पुतळे हारीने मांडून ठेवलेयत, त्यात मध्यभागी हा पुतळा आहे.. गेली अनेक वर्ष ऊन-वारा-पाऊस व पक्ष्यांच्या शिटा झेलून महाराणीच्या चेहेऱ्याची साफ विटंबना झालेली आहे.. तिचं नाक साफ झडलं असून हातातला राजदंड तुटलाआहे.. पुरेश्या काळजी अभावी मुळच्या पांढऱ्याशुभ्र असलेल्या या देखण्या शिल्पावर काळपट पुटं चढलीत. असं असुनही पुतळ्याचं मूळ सौंदर्य जराही उणं झालेलं नाही.. सिंहासनावरील कलाकुसर आणि राजचिन्हं, आता उठून उभी राहील असा भास निर्माण करणारी तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ कराव्या असं वाटायला लावणाऱ्या, तीनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या, केवळ लाजबाब..! सोबत पुतळ्याचे काल-परवाच काढलेले फोटो आहेत. पण नुसते फोटो बघण्यापेक्षा थोडीशी सवड काढून राणीच्या बागेत जावून ही अप्रतीम कलाकृती रूबरू बघून याच असं मी सांगेन..

या पुतळ्याचा इतिहास पाहता महाराणी व्हिक्टोरीयाच्या हा पुतळा कदाचित 'जन्मल्या'पासूनच एका जागेवर न राहाण्याचं नशीब घेऊन आला होता की काय कुणास ठाऊक..!

सन १८५८ मध्ये राणीने हिन्दुस्थानचा कारभार ईस्ट इंडीया कंपनीकडून आपल्या हातात घेतला, या घटनेच्या स्मरणार्थ राणी व तिचा नवरा प्रिन्स अल्बर्ट यांच्या नांवाने भायखळा येथे एक बाग व म्युझियम 'व्हिक्टोरीया गार्डन अॅण्ड अल्बर्ट म्युझियम' स्थापन करण्याचे तत्कालीन मुंबईकरांनी ठरवलं. (याचंच पुढे राणीचा बाग व स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात ‘जिजामाता उद्यान’ असं नामकरण झालं) या कार्याचे पुढारी होते आपले जगन्नाथ नाना शंकरशेट, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि काही बडे ब्रिटीश अधिकारी..

मुळात या बागेत राणीचाच पुतळा बसवायचा होता, परंतु तसे केल्यास तिच्या नवऱ्याला काय वाटेल या ‘हिंदुस्थानी’ विचाराने ‘प्रिन्स अल्बर्ट’चा पुतळाही तिथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. राणीच्या सन्मानार्थ हा पुतळा बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडेराव गायकवाड यांनी रोख ८० हजार रूपये खर्चून प्रख्यात इंग्लिश शिल्पकार एन. नोबेल यांच्याकडून घडवून घेतला होता.. परंतू पुतळ्याचं रुपडं पाहताच गायकवाड सरकार राणीच्या बागेत पुतळा स्थापन करायला तयार होईनात व त्या ऐवजी मुंबई शहरातील कोटाच्या (फोर्ट) बाहेर प्राईम जागी हा पुतळा बसवावा असा हट्ट ते धरून बसले.. अखेर खंडेराव गायकवाडांच्या हट्टापाई शेवटी 'राणी'ची प्रतिष्ठापना वर उल्लेख केलेल्या जागी करण्यात आली व सन १९४७ नंतर पुन्हा 'राणी'ला भायखळ्याच्या तिच्या सुरूवातीस मुक्रर केलेल्या जागी आणून 'टाकलं' गेलं. राणीचा हा सुंदर पुतळा अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बेवारश्यासारखा अजून तिथेच बसून आहे.. तर अल्बर्ट महाराजांचा काहीच पत्ता लागत नाहीय..

जाता जाता -

पुतळ्याची सुरुवातीची जागा राणीची बाग काय किंवा नंतरची 'टाटा टेलिकम्युनिकेशन्स'ची जागा काय, राणीच्या सिंहांसनाधिष्ठीत मूळ पुतळ्यात मखराची कल्पना नव्हती.. संगमरवरी मखर नंतर मुद्दाम बनवलं गेलं होतं.. स्वतंत्र भारतात या पुतळ्याची रवानगी भायखळ्याच्या राणी बागेत केली गेली तरी त्या पुतळ्याइतकंच, किंबहूना कांकणभर सरसच असलेल्या त्या मखराचं काय झालं असावं हा प्रश्न मला पडला होता.. माझ्या परीनं मी शोध घेत होतो.. माझ्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांत या पुतळ्याचा व त्याच्या सध्याच्या पत्त्याचा उल्लेख सापडायचा, परंतू मखराचा उल्लेखही नसायचा..

परंतू शोधला की देवही सापडतो या उक्तीप्रमाणे अगदी परवाच, नेटवर सर्च करताना, मला मखराचा ठावठिकाणा अचानक सापडला.. विख्यात रेमंड कंपनीचे मालक श्री.सिंघानीया यांच्या मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बंगल्याच्या आवारात उघड्यावर परंतू सुरक्षित असल्याचा उल्लेख http://thefourthseat.blogspot.in/2014/01/the-mystery-of-missing-marble-canopy-of.html?m=1 या वेबसाईटवर मिळाला..आपण या वेबसाईटला जरूर भेट देऊन माहिती घ्या.. अर्थात हा पत्तोल्लेख २०१४ सालचा आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे मला अद्याप प्रत्यक्ष बघाचीय.. या आठवड्यात जमवेन बहुतेक.. कोण येतंय सोबत?

- गणेश साळुंखे
9321811091
(12.04.2016)

मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले.. (भाग ४ व शेवटचा)

‘मार्क्विस आर्थर वेलस्ली’ आणि ‘क्विन व्हिक्टोरिया’ – हरवलेले पुतळे

मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग.. या भागात मुंबईत पूर्वी असलेल्या परंतू स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या जागेवरून ‘हलवले’ल्या आणि आता 'हरवले’ल्या दोन पुतळ्यांची माहिती आपण घेऊ..

मागच्या तिसऱ्या भागात आपण हॉर्निमन सर्कल व त्यातील कारंजाच्या (एशियाटीक कडे पुढा करून उभं राहीलं असता) उजव्या बाजूस देवळीत स्थानापन्न असलेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची माहिती घेतली होती.. या लेखाचा विषय असलेला 'मार्क्विस ऑर्थर वेलस्ली' याचा पुतळा हॉर्निमन सर्कल मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याच्या बरोबर समोर, म्हणजेच कारंजाच्या डाव्या बाजूस होता.. ऑर्थर वेलस्ली सन १७९८ साली कोलकाता येथे गव्हर्नर जनरलच्या पदावर होते.. कॉर्नवॉलिसप्रमाणे हे ही जबरी योद्धे होते.. १८०३ साली मराठ्यांबरोबर आसे येथे झालेल्या लढाईत यांनी मराठ्यांवर विजय मिळवला होता व त्यांच्या या विजयाच्या सन्मानार्थ हा पुतळा येथे बसवण्यात आला होता.

हा पुतळा मोठा नमुनेदार होता. एका उंच चंबूतऱ्यावर वेलस्ली बसले होते. बाजूला खाली त्यांची मॅडम बसली आहे आणि दुसऱ्या बाजूस खाली एक देशी नागरिक उभा आहे. वेलस्ली त्या देशी नागरिकाला एक तोडा बक्षीस देत असून त्याची शेजारी खाली बसलेली मॅडम चबुतऱ्यावर असलेल्या “Wisdom, Energy, Integrity” या शब्दांकडे बोट दाखवत आहे. पुतळ्याचा चबुतरा ज्या चौथऱ्यावर बसवलाय, त्या चौथऱ्याच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस सिंहाचा पुतळा आहे. वाघ हे भारताचे प्रतिक तर सिंह इंग्लंडचे.. आसेच्या लढाईत सिंहाने वाघावर म्हणजे ब्रिटीशांनी मराठ्यांवर विजय मिळवला असे हे वाघ-सिंहाचे पुतळे सुचवत आहेत.. हा पुतळाही स्वराज्यात हलवला गेला सध्या या पुतळ्याचा मुक्काम कुठे आहे याचा काहीच ठाव ठिकाणा कळत नाही.. हा ‘हरवलेला’ पुतळा आहे. याचे एक जुने चित्र इंटरनेटवर मिळाले, ते सोबत जोडत आहे.
‘हरवलेला’ दुसरा पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा..!

आपण सीएसटी स्टेशनच्या पश्चिम दिशेने बाहेर पडून डाव्या हाताला दहा-बारा पावलं चाललो की स्टेशनचं भव्य मेन गेट लागतं.. या मेन गेट समोर, समोरच्या कॅपिटल थेटराकडे पाठ करून उभं राहिलं की स्टेशनचा घुमटादार मुख्य मनोरा व त्याखालच्या महिरपीतलं भव्य घड्याळ दिसतं. या घड्याळाखाली एक उभट रिकामा कोनाडा दिसतो त्याकडे आपलं लक्ष गेलंय कधी? या रिकाम्या कोनाड्यात स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा सहा-साडेसहा फुटी उंच पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर इतर पुतळ्याप्रमाणे तो ही इथून ‘हलवला’ गेला परंतु तो सध्या ‘हरवलेला’ आहे. सध्या हा पुतळा नेमका कुठे आहे हे शोधूनही सापडले नाही. सोबत या ठिकाणी असलेल्या राणीच्या पुतळ्याचा जुना फोटो व सध्याचा रिकामा कोनाडा असलेला नविन फोटो देत आहे.

‘व्ही.टी.’ स्टेशनचं नामकरण १९९६ साली ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं झालं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या स्टेशनला दिलंय त्यांचा पूर्णाकृती पुतळा स्टेशनच्या रिकाम्या कोनाड्यात राणीच्या जागी स्थापन केल्यास स्टेशनच्या नामकरणास अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं.

जाता जाता –

हॉर्निमन सर्कलमध्ये समोरासमोर असलेल्या कॉर्नवॉलिस आणि वेलस्ली या दोन पुतळ्यांनी त्याकाळी मोठी धमाल उडवली होती.. कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला स्थानिक हिंदू लोक हळू हळू देव मानायला लागले होते.. त्याची पूजाअर्चा करून त्यांना नवसही बोलू लागले होते.. कॉर्नवॉलिस याच्या पुतळ्यांच्या बाबतीत माडगावकर त्यांच्या १८६२ साली प्रकाशित ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात लिहितात, “या पुतळ्याला कित्येक हमाल, दुसरे गरीब गुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ, विडा, दक्षिणा ठेवून मानणूक करीत. परंतु अलीकडे सरकारने हे खूळ बंद करून टाकिले आहे. आता कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोर पोलीस ठेऊन गर्दी हटवली तर लोक वेलस्लीच्या पुतळ्याला भजायला लागले.. हा कोणीतरी नवा विलायती देव सरकारने आपल्यासाठी पाठवला आहे असा त्या काळच्या लोकांचा समज होऊन इथेही पुन्हा तोच प्रकार घडायला लागला. शेवटी या ठिकाणीही सरकारला पहारेकरी ठेवावे लागले होते असं माडगावकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

-गणेश साळुंखे
९३२१८११०९१
संदर्भ - ‘मुंबईचे वर्णन’, ले.गोविंद माडगावकर, सन १८६२

"मुंबईचा 'फोर्ट'.."

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला 'फोर्ट' एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही.. फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंच मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..!

मुंबईचा फोर्ट एरीया हा प्रामुख्याने व्यापारी व कार्यालयीन परिसर आहे. निवासी मनुष्य वस्ती इथं अगदी तुरळकच सापडते. ब्रिटीशराज मध्येही हा ब्रिटीशांच्या व्यापाराचा महत्त्वाचा हिस्सा होता.. फोर्ट म्हणजे किल्ला. जुने मुंबईकर फोर्टचा उल्लेख 'कोट' असा करायचे व 'कोट' या मराठी शब्दाचा अर्थही किल्ला असाच आहे (आठवा, गड-कोट).

तर या परिसराला 'फोर्ट' हे नांव पडण्यामागे या परिसरात इंग्रजांचा 'किल्ला' होता हे आहे. मुळात हा किल्ला इंग्रजांचा नसून पोर्तुगिजांनी बांधलेला होता.. पोर्तुगीज वनस्पती शास्त्रज्ञ 'गोर्सिया दा ओर्ता' हा मुंबई बेट लीजवर घेऊन अभ्यासासाठी इथं मुक्कामाला होता. स्वत:च्या निवासासाठी त्याने 'मनोर हाऊस' नावाचे किल्लेवजा घर बांधले होते. या घराचं लोकेशन सध्याच्या एशियाटीक सोसायटीच्या मागं कुठतरी होतं... (मूळ 'मनोर हाऊसचे' दोन दरवाजे व त्यातील एक बुलंद इमारत अजूनही शाबूत असून ती नेव्हीच्या ताब्यात आहे.) हा परिसर सध्या नेव्हीच्या (आय.एन.एस. आंग्रे) ताब्यात असल्याने तिथं कोणाला जाता येत नाही.

मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर या 'मनोर हाऊस'चा ताबाही ब्रिटीशांकडे आला. ब्रिटीशांनी आपल्या व्यापारी पेढीचे सागरी शत्रूंपासून संरक्षण करणे या हेतूनं किल्ल्याचा उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेकडे विस्तार करून त्याला पक्के बुरूज व मजबूत तटबंदी केली.. किल्याच्या तटबंदीला तीन मुख्य दरवाजे होते. उत्तरेस, सध्याच्या सीएसटी स्टेशनसमोरच्या दरवाजाला 'बझार गेट', दक्षिणेला आताच्या काळाघोडा किंवा जहांगीर आर्ट गॅलरीच्या परिसरातअसलेल्या गेटला 'अपोलो गेट' तर पश्चिम दिशेस 'चर्च गेट' अशी नावं दिली.. 'चर्चगेट' हे सध्याचं जे फ्लोरा फाऊंटन आहे, बरोबर त्याच कारंजाच्या जागी होतं.. पूर्वेस तर समुद्राचंच सानिध्य होतं.. पूर्वेकडचा समुद्र आणि उर्वरीत बझारगेट, अपोलोगेट व चर्चगेट अशा चार दिशांच्या आतील भागाला 'फोर्ट' हे नांव मिळालं, तेथे आज किल्ला अस्तित्वात नसला तरी चार-साडेचारशे वर्षांनंतरही कायम आहे व 'फोर्ट' नांवाने ओळखला जाणारा भागही तोच आहे.. इतिहासात या किल्ल्याचा 'बॉम्बे कॅसल' असाही उल्लेख आहे.

किल्ल्याच्या तीन गेट्सपैकी 'अपोलो गेट' तर नांवासकट गायब झालं आहे तर 'चर्च गेट' व 'बझार गेट' नांवापुरतं का असेना, अस्तित्त्वात आहे.. इंग्रजांचा 'फोर्ट' कधीचाच काळाच्या पडद्याआड गेला असला तरी या किल्ल्याचा नेपोलियनच्या हल्ल्याच्या भितीने सीएसटी स्टेशनच्या मागील बाजूस केलेल्या वाढीव तटबंदीचा भाग मात्र अजुनही बऱ्यापैकी शाबूत आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटीशांनी नांव दिलं 'फोर्ट सेंट जॉर्ज'..! सध्याचं सेंट जॉर्ज हॉस्पिटल याच्याच भागावर उभारून त्याला 'सेंट जॉर्ज' असं नांव दिलंय ते त्यामुळेच..! (संदर्भ-स्थलकाल, अरुण टिकेकर)

सीएसटी स्टेशनच्या मागे असलेल्या 'पी.डीमेलो' मार्गाने (आताचा शहीद भगतसिंग मार्ग) जाताना, सेंट जॉर्ज हास्पिटलचं या रस्त्यावरचं प्रवेशद्वार व सीएसटी स्टेशनचं नव्याने बांधलेलं मागील प्रवेशद्वार यांच्या दरम्यान किल्ल्याचा हा भाग आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारातूनही याच्याकडे जाता येतं..

किल्ल्याचा हा तटबंदीसहीतचा हा भाग मुळात दारूगोळ्याचं कोठार होतं.. शहराच्या वाढत्या पसाऱ्याला मोकळीक मिळावी म्हणून तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर याने वर उल्लेख केलेल्या तिन्ही 'गेट्स'च्या दरम्यानची तटबंदी १८६० साली तोडून टाकली मात्र 'फोर्ट सेंट जॉर्ज'चं बांधकाम येवढं मजबूत होतं, की ते तुटता तुटेना व म्हणून ते तसंच ठेवलं गेलं व म्हणूनच ते आजही आपल्याला पाहाता येतं.. अगदी रस्त्यावरून मशीद बंदरच्या दिशेने जातानाही किल्ल्याची भिंत सहज पाहता येते.. या किल्ल्याच्या बुलंद भिंती, त्यात शत्रुवर दारुगोळा डागण्यासाठी ठेवलेल्या उभट, अरुंद फटी (गनस्लीट्स), किल्ल्याचं दणकट छत,आतील तीन-साडेतीन फुट रुंद भिंती पाहता येतात.

सध्या या 'किल्ल्यात' महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याचं ऑफिस असून तिथं श्री.बी.व्ही.कुलकर्णी नांवाचे इतिहासाविषयी आस्था व अभ्यास असणारे संचालक आहेत. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी सर्व माहिती आनंदाने दिली व किल्ल्याचे फोटोही काढू दिले.. त्यांनी मुंबई व परिसरातल्या किल्ल्यांवर लिहिलेल्या पुस्तकाची झेरॉक्सही अगत्याने दिली.. इतका सहृदय सरकारी अधिकारी असू शकतो हे त्यांना भेटून कळतं..

प्रत्येकाने आपल्या इतिहासाचे ते अवशेष प्रत्यक्ष बघावेत व आपल्या इतिहासाची छोटीशी सफर करून यावी असं सुचवावंसं वाटतं..
-गणेश साळुंखे09321811091

धारावीचा काळा किल्ला (भाग एक)

‘धारावी’ आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो.

इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव 'फोर्ट रिवा किंवा रेवा' असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला 'काळा किल्ला' या नांवानेच ओळखला जातो. या इतिहास पुरुषाचं आजचं वय वर्ष २८० मात्र..!!

धारावीच्या 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'च्या समोर 'बीईएसटी'चे धारावी व काळा किल्ला असे शेजारी शेजारी दोन बस डेपो आहेत. या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला अगदी लागून हा 'काळा किल्ला' उभा आहे. बस डेपोच्या उगवतीच्या दिशेच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या पॅसेजमधून थेट या किल्ल्याकडे जायला वाट आहे.

मी व माझे सहकारी श्री.अनिल पाटील नुकतेच हा किल्ला पाहून आलो. हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेश करण्यासाठी याला दरवाजा नाही. आता मुळात दरवाजाच नव्हता की आजुबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही. पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आंत प्रवेश करता येतो.

किल्ल्याची तटबंदी मूळची अती मजबूत असल्याने अजून शाबूत आहे. तटबंदीच्या दर्शनी भागावर "सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला" अशी दगडात कोरलेली पाटी असून सदर मजकुराखाली 'इंजिनिअर' म्हणून कोणाची तरी आद्याक्षरे कोरलेली आहेत.

किल्ल्याची तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजुनही सुरक्षित आहेत. किल्ल्याच्या आतील भागाचे फोटो काढण्यासाठी आम्ही किल्ल्याला लागून अभ्या असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. वरुनही किल्ला झोपड्यांच्या व झाडांच्या गराड्यात हरवून गेला होता. वरुन दिसणारा किल्ल्याचा बाणाच्या फाळासारखा आकार लक्षात येत होता. या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख bijoor.me या वेबसाईट वर सापडतो परंतु आम्ही आत न गेल्याने ते पाहता आले नाही..

इमारतीच्या गच्चीवरून समोर उत्तरेला मिठी नदीचे पात्र, पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेला माहीमचा किल्ला आणि पूर्वेच्या टेकडीवरचा सायनचा किल्ला अस्पष्टसा दिसत होता. सायन ते माहीमच्या दरम्यान मिठी नदी (माहीमची खाडी) पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहते. एके काळी या मिठी नदीचं पात्र विस्तीर्ण असून ते या काळ्या किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत होतं अशी इतिहासात नोंद आहे. धारावी बस डेपो, डेपोपलीकडील मोठा रस्ता व निसर्ग उद्यान या सगळ्या आजच्या काळातील गोष्टी मिठी नदीच्या पात्रात भरणी टाकून केलेल्या आहेत हे त्या इमारतीच्या गच्चीवरून बघताना सहज लक्षात येत होतं.

'काळा किल्ला' मिठी नदीच्या दक्षिण तिरावर असून माहीमचा किल्ला मिठी नदी समुद्रास जिथे मिळते त्या ठिकाणी आहे तर पूर्वेचा सायनचा किल्ला याच मिठी नदीच्या दक्षिण तटावर सायनच्या टेकडीवर उभा आहे. हे तिन्ही किल्ले ‘ब्रिटीश मुंबई’च्या उत्तर सीमेचे खंदे रखवालदार होते.

ब्रिटीशांच्या ताब्यात तेव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा इलाखा होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश, ‘साष्टी’ इलाखा, म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी त्यांच्या ताब्यातील भूभागाचे सागरी शत्रूंपासून रक्षण व्हावे या हेतूने वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर (आताच्या ‘ताज लॅण्ड्स एंड’ किंवा ‘हॉटेल सी रॉक’ येथे) बांधलेला ‘केस्टेला डी अग्वादा’ अगदी आजही बघता येतो.

या लेखाचा विषय असलेला ‘काळा किल्ला’ ब्रिटीशांनी इसवी सन १७३७ मध्ये बांधला हे आपण सुरुवातीस पाहिले. सन १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटीशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे इलाख्याचे रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची निकड वाटली आणि त्यातून या किल्ल्याची निर्मिती झाली. एका अर्थाने ‘काळा किल्ला’ मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे असे म्हटले तर चुकणार नाही.

जाता जाता -

‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. मुंबईतील धारावी व भाईंदर येथील ‘धारावी’ याचा काय संबंध असावा किंवा मुंबईतल्या धारावीचे, ‘धारावी’ व किल्ल्याचे ‘रीवा फोर्ट’ अशी नांवे कशी पडली असावीत, या संबंधी एक तर्क पुढील भाग दोन मध्ये..!

                        धारावीचा काळा किल्ला (भाग दोन व शेवटचा)

या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे.

‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ असे आहे. जनरली किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव किंवा किल्ल्याच्या गावाच्या नावावरून किल्ल्याचे नाव पडणं कॉमन आहे. ‘रीवाचा किल्ला’ आणि ‘धारावी’ या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे हे निश्चितच. या संबंधाने मी काही तर्क केले आहेत, ते इथे देतोय..
किल्ल्याच्या नावाबाबत तर्क

हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला व त्याला नाव दिले ‘फोर्ट रीवा’ असा अनेक ग्रंथात उल्लेख आहे. मिठी नदीच्या किनारी, मोक्याच्या जागेवर हा किल्ला आहे. नदी जवळचा किल्ला म्हणजे इंग्रजीत ‘The River Fort’. या ‘The River Fort’चं बोलीभाषेत ‘द रीवा फोर्ट’ झाले असणे शक्य आहे व पुढे काळाच्या ओघात ‘द’ गळून केवळ ‘रीवा’ शिल्लक राहिला असणे सहज शक्य आहे. पोर्तुगीज भाषेत तर नदीला 'रिओ' असंच म्हणतात हा उच्चारही 'रिवा'च्या जवळ आहेच. अशा तऱ्हेने या किल्ल्याचे नाव ‘फोर्ट रीवा’ झाले असावे..!
‘धारावी’च्या नावाबाबत तर्क

मुंबई परिसरातील ‘धारावी’ हे नाव ‘धारा देवी’ या देवीच्या नावावरून आले असावे अशी शक्यता इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी त्यांच्या ‘महिकावतीच्या बखरी’त मांडला आहे. परंतु या परिसरात ‘धारा देवी’ नावाची देवी होती असल्याचे शोधूनही सापडले नाही. हां, नाही म्हणायला ‘धारेश्वर’ नावाचे शंकराचे देऊळ असल्याचा उल्लेख सापडतो. राजवाडे यांनी मांडलेली शक्यता भाईंदर येथे सिद्ध झाली आहे..तिथे ‘धारावी किल्ला’ही आहे आणि ‘धारावी देवीही’, परंतु मुंबईत तसा धागा सापडला नाही.

इतिहासाचार्यांच्याच बखरीचा आधार घेऊन असे म्हणता येते की, सन १३०० च्या आसपास मध्ये बिम्ब नावाचा राजा प्रसिद्ध झाला व त्याने महिकावती (मुंबई माहीम) शहर वसवले. हा राजा साष्टी (ठाणे) इलाख्यातून येथे आला होता. या राजा बिम्बाने मुंबईत नव्याने राजधानी वसवताना आपल्या साष्टी इलाख्यातील स्थानाचीच नावे इथल्या स्थानांना दिली असे दिसते. उदा. ‘माहीम’ मुंबईतील व केळवे-पालघरमधील, ‘नायगाव’ हे ठाण्यातही आहे आणि मुंबईतही, शितलादेवी पालघर व मुंबईतील माहीमच्या शिवेवरही सापडते. तद्वत राजा बिम्बाने भाईंदर येथील ‘धारावी’चे नाव, माहीमपासून जवळच असलेल्या परिसराला देऊन त्याचे नाव ‘धारावी’ ठेवले असावे का?

की, ‘ब्रिटीशांच्या ‘द रीवा’ या किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश पुढे ‘धारावी’ होऊन या किल्ल्याच्या परिसराला ‘धारावी’ हे नाव मिळालं असावं का? मला तरी दोन्ही तर्क पटतात. बघा आपल्यालाही पटतात का.

- गणेश साळुंखे
9321811091

शिवडीचा किल्ला

मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपत आजही चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे. 

द कुन्हा नाम इतिहासकाराच्या मते शीवजवळील छोटी जागा अशा अर्थी त्याला शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवडी हे बेट तसे मोक्याचे ठिकाण. पूर्व बाजूला अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला शीवचे बेट. दोघांच्या मध्ये अर्थातच खाडी. उत्तरेस खाडीच्या पलीकडे साष्टी बेट असे बेटाचे भौगोलिक स्थान होते.

अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत शीव व शिवडीच्या दरम्यान अनेक मिठागरे होती व ती अगदी माहुलीच्या खाडीपर्यंत होती. शिवडीला स्थानिक मच्छिमार अर्थातच होतेच व त्यांच्याही नौका पनवेलच्या खाडीपर्यंत जाऊन अन्नधान्य, भाजीपाला व तत्सम जीवनावश्यक वस्तूंची ने आण करत होत्या.

शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले होते.

मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व व वस्तुसंग्रहालय खात्याने 2007-2008 केले. किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणाऱ्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात.

मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील ऐका खडकाळ टेकडीवर हा किल्ला आहे. बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आत आणखी एक तटबंदी किंवा भक्कम तटबंदीयुक्त वास्तुसमूह असे या किल्ल्याचे ढोबळ स्वरुप आहे. या किल्याचे सर्वात बाहेरचे अंग म्हणजे सर्वसाधारणपणे चौकोनी तलविन्यास म्हणता येईल अशाप्रकारची सीमाभिंत. ही सीमाभिंत जाड पण सरळसोड असून पूर्णपणे दगडात बांधलेली आहे. या भिंतीला तांत्रिक दृष्ट्या बाह्य तटबंदी किंवा बाह्यतम तटबंदी असेही म्हणावेसे वाटेल. या किल्‍ल्याच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्यत्तम सीमाभिंतीत असे एकूण दोन दरवाजे आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारात फक्त दरवाजांचे आकार शिल्लक आहेत. एकेकाळी त्यांना दारे असणार.

बाह्यतम तटबंदीच्या दक्षिणाभिमुख दरवाज्यातून आत गेल्यानंतर अगदी वीस-पंचवीस फुटावरच मुख्य भागाच्या अनियमित आकाराच्या तटबंदीतील दक्षिणकेडील पूर्वाभिमुख भागात एक प्रवेशद्वार आहे. या द्वाराच्या रुंदीच्या भागात काही अंतरावर दाराच्या चौकटीच्या खाचा गिलाव्यामध्ये स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे या भितीच्या रुंदीत एकेकाळी लाकडी किंवा लोखंडी चौकट व दारे असण्याची शक्यता आहे. या भिंतीची रुंदी बरीच आहे. त्यामुळे हा द्वारमार्ग छोट्या भुयारी मार्गासारखा वाटतो.

शिवडी किल्ल्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत येत असतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन मुंबईकरांसह जगभरातील पर्यटकांना येथे घेता येते.

पुरातत्त्व खात्याने नुतनीकरण केल्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला आणि लगतच्या समुद्रात दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी या दोन्ही बाबी पर्यटन स्थळ म्हणून महत्त्वाच्या ठरतात.

कसे जावे -
हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकापासून पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गाच्या खालून जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने सरळ चालत गेल्यास दहा मिनीटांच्या अंतरावर हजरत अली बाबांचा दर्गा लागतो. या दर्ग्याच्या लगतच या किल्ल्याचे द्वार आहे.

संकलन - विलास सागवेकर

तारापोरवाला मत्स्यालय

मुंबईमध्ये पर्यटन स्थळांची कमतरता नाही. परंतु काही ठिकाणं लहान मुलांच्या आवडीची तर काही मोठ्यांच्या. त्यामुळे मुंबईच्या रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही काय काय पहावे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु या यादीत सर्वांना आवडणारं एक ठिकाण कायम स्थान मिळवून आहे ते म्हणजे मरीन ड्राईव्हवरचं तारापोरवाला मत्स्यालय.

अरबी समुद्राची गाज आणि खारे वारे अंगावर घेत गेली अनेक दशके पर्यटकांच्या सेवेत असलेल्या या मत्स्यालयाचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते २७ मे १९५१ रोजी झाले. तेव्हा या मत्स्यालयाच्या बांधकामासाठी एकूण ८ लाख ९० हजार रूपये खर्च आला होता, ज्यापैकी श्री. व श्रीमती विकाजी डी.बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी जोडप्याने दोन लाख रूपये देणगी दिली होती. या मत्स्यालयाची देखभाल दुरूस्ती महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येते.

१९५१ मध्ये जेव्हा हे मत्स्यालय पर्यटकांना खुले करण्यात आले तेव्हा भारतातील हे एकमेव सार्वजनिक मत्स्यालय होते. या ठिकाणी प्रेक्षकांना एकाचवेळी समुद्रातील, गोड्या पाण्यातील तसेच उष्णकटीबंधातील लहान शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्याने हे देशातील एक प्रेक्षणीय स्थळ ठरले आहे. दरवर्षी चार ते पाच लाख पर्यटक भेट देणाऱ्या या मत्स्यालयाला आजपर्यंत देशविदेशातील महनीय व प्रसिद्ध व्यक्तींनीही भेट दिली आहे.

सदर मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४,०९६ चौ.मी. असून मत्स्यालयाच्या इमारतीचे क्षेत्रफळ १,०९८ आणि खुले क्षेत्र २,९९८ चौ.मी. आहे. मत्स्यालयामध्ये नुतनीकरणाआधी प्रदर्शनार्थ १६ सागरी, ९ गोड्या पाण्याच्या मोठ्या टाक्या आणि ३२ उष्णकटीबंधीय लहान टाक्या होत्या. या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे सागरी आणि गोड्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले होते.

सहा दशके जुने असलेल्या मुंबईतील या महत्त्वाच्या पर्यटनस्थळामध्ये सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज होती. त्यानुसार ते अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहेत. नुतनीकरणासाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर मागील वर्षी ३ मार्च २०१५ रोजी हे मत्स्यालय पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. आता पर्यटकांना स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ, विलोभनीय, शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये पूर्वी स्थानिकरित्या मिळणारे ३० ते ५० प्रकारचे विविध मासे व जलजीव पहावयास मिळत. त्यासाठी मुंबईतील कुलाबा लाईट हाऊस, गिरगाव चौपाटी, वरळी चौपाटी, कफ परेड या क्षेत्रातील समुद्र किनारी वाणा, फेरा पद्धतीची जाळी लावून स्थानिक कोळी बांधवांच्या सहकार्याने नियमितपणे मासे व जलजीव उपलब्ध करून घेऊन ते मत्स्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येत असत. सदर परंपरा आजही चालू आहे.

पूर्वीच्या टाक्या आता आकाराने मोठ्या करण्यात आल्या असून त्यांना फ्लेक्सी ग्लास प्रकारच्या ११० मि.मी. जाड काचा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिमेंटच्या भव्य टाक्यांमधील रंगीत आणि आकर्षक मासे व इतर जलजीव अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. प्रत्येक टाकीमध्ये खाऱ्या व गोड्या पाण्यातील आकर्षक शोभिवंत मासे व जलजीवांच्या विविध प्रजाती, नैसर्गिक वातावरणानुरूप खडक, पान वनस्पती इत्यादींसह आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केलेल्या पाहायला मिळतात. त्यांची माहिती एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केली जात असल्याने पर्यटकांना त्याबाबत सविस्तर माहितीही मिळते. नुतनीकरणानंतर संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलीत करण्यात आले असल्याने पर्यटकांना थंड आणि सुखद वातावरणात ही जलसृष्टी अनुभवता येत आहे.

नुतनीकरण करण्यात आलेल्या मत्‍स्यालयाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे ते म्हणजे प्रवेशद्वारापाशी निर्माण करण्यात आलेले भुयारी मत्स्यालय. याखालून जाताना १८० अंशामध्ये खाऱ्या पाण्यातील मासे पाहण्याचा अनुभव घेता येतो. भुयारी मत्स्यालयातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ५० आसनव्यवस्थेच्या वातानुकूलीत प्रेक्षागृहामध्ये मत्स्यालयातील मासे, मत्स्यव्यवसाय, सागरी मासेमारी आदींबाबत वैज्ञानिक तसेच उद्बोधक माहितीपट पाहता येतात. समोरच कारंजा उभारण्यात आला असून वातावरण आल्हाददायक बनविण्यात तो मदत करतो. त्यापुढे मुख्य प्रदर्शनी हॉल आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये स्थानिकरित्या मिळणाऱ्या लेपटी, किळीस, पाकट, हेकरू, तांब, खडकपालू, शेवंड, समुद्रसाप, जेलीफिश यांच्याबरोबरच आता भारतातील तसेच परदेशातून आयात केलेले अतिशय दुर्मिळ डॅम्सेल, बटर फ्लाय, एंजल, ट्रिगर, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मूरीश, सी ॲनीमोन इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हॉलच्या मधील भागात ठेवण्यात आलेल्या गोड्या पाण्याच्या विभागामध्ये देखील देश विदेशातील अरोवाना, बेडूक, सिक्विड, पिरान्हा, कॅट फिश, रोहू, कटला, मृगळ इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे व जलजीव पाहायला मिळतात. तर, छोट्या प्रदर्शनी विभागात लहान टाक्यांमध्ये गोल्ड फिश, एंजल, गोरामी, बार्ब, शार्क, फ्लॉवर हॉर्न, सिक्लिड, पॅरट, ट्रेटा, गप्पी, कोळंबी, डिस्कस इत्यादी प्रजातींचे आकर्षक मासे पाहता येतात.

सदर मत्स्यालयासाठी मोठ्या व्यक्तींना ६० रूपये तर १२ वर्षाखालील मुलांना ३० रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तर, शैक्षणिक संस्था, दिव्यांग व्यक्ती, सैनिक व प्रशासकीय सेवेतील निवृत्त कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना सवलतीचे दर ठेवण्यात आले आहेत. मत्स्यालयाच्या आतले छायाचित्रण करण्याची इच्छा असलेल्यांसाठी त्यासाठीचे शुल्क भरून छायाचित्रण करू देण्याची सोयही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंगळवार ते रविवार सुरू असणाऱ्या या मत्स्यालयाच्या प्रदर्शनाची वेळ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ आणि इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशी आहे. सोमवारी ते देखभाल, दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येते. पश्चिम रेल्वेवरच्या मरीन लाईन्स किंवा चर्नी रोड स्टेशनवर उतरून येथे जाता येतं अथवा मरीन ड्राइव्ह वरून जाणाऱ्या रस्ते वाहतुकीचाही पर्याय आहेच.

सध्या विद्यार्थ्यांना सुट्टया आहेत. त्यामुळे मुंबई दर्शन करताना मरीन ड्राईव्ह वरील तारापोरवाला मत्स्यालयाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मग आपण कधी नियोजन करताय मत्स्यालयाला जायचं....

-ब्रिजकिशोर झंवर
सहायक संचालक (महान्यूज)











No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...