आठ एप्रिलला सकाळी पुण्याहून विमानाने दिल्लीला पोचून, मग दिवसभर दिल्ली विमानतळावर थांबून संध्याकाळी डेहराडूनला पोचणार होतो. तिथे आधीच ठरवलेला ड्रायव्हर आम्हाला चक्राताला घेऊन जाण्यासाठी येणार होता. हे सुरळीतपणे पार पडेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात पहाटे लवकर उठणं, मग दिवसभर विमानतळावर बसून राहणं, वेळी-अवेळी खाणं आणि शिवाय डेहराडूनहून चक्राताला जाणारा वळणदार रस्ता, या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि (पुलंच्या शब्दात सांगायचं तर ) गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं मुलांना निराळ्या अर्थाने लागायला लागली! त्यामुळे थांबत थांबत, सावकाश जात आम्ही रात्री नऊ-साडेनऊला हॉटेलला पोचायच्या ऐवजी अकरानंतर पोचलो! आपण आधी मनाशी ठरवलेला, डेहराडूनला एक रात्र राहून मग सकाळी चक्राताला जाण्याचा मूळ प्लॅनच बरोबर होता, पहिल्याच दिवशी एवढा त्रास झाल्यावर आता यापुढचे रोजचे वळणदार प्रवास कसे काय पार पडणार, या विचारांनी मला चांगलीच काळजी वाटायला लागली होती. रस्त्याच्या कडेला दिसणारे शिल्लक किलोमीटरचे आकडे अगदी सावकाश कमी होत होते. कधी एकदा हॉटेलला पोचतो, असं झालं होतं. अखेरीस पोचलो, खोलीत शिरलो आणि थंडीने कुडकुडायला लागलो. ती थंडी पाहून मुलं तर थेट पांघरुणातच शिरली. एवढा उशीर होऊनही हॉटेलच्या स्टाफने गरम गरम जेवण तयार ठेवलं होतं. खरं म्हणजे जेवायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांनी तयार ठेवलेलं स्वादिष्ट गरम जेवण पाहून जेवावंसं वाटलं आणि आम्ही दोघं थोडं थोडं का होईना, पण जेवलो.
दुसर्या दिवशी हॉटेलवरच थांबून विश्रांती घ्यायची असं आधीच ठरवलेलं
होतं. तरी सकाळी सहाच्या आधी जाग आलीच. सकाळी सकाळी हॉटेलच्या आवारातून
भरपूर पक्षी दिसतात हा गेल्या वेळेचा अनुभव आठवून मी लगेचच बाहेर गेले आणि
सुरुवातीलाच चक्क कलिज फेजन्ट हा कोंबड्याच्या कुळातला देखणा पक्षी दिसला.
नर आणि मादी, दोघेही दिसले. नर दिसायला जास्त रुबाबदार असतो. हे पक्षी
कोंबड्यांसारखेच, जमिनीवरच जास्त दिसतात. झुडपांखालीच जास्त करून वावरतात.
कलिज फेजन्ट नर
हाही तोच आहे.
कलिज फेजन्ट मादी
ब्लू व्हिसलिंग थ्रश (शीळकरी कस्तुर) हा पक्षी यावेळी भरपूर संख्येने दिसला. त्यांचा सध्या प्रियाराधनेचा काळ सुरू असावा, कारण जोडीजोडीने दिसत होते पक्षी. संध्याकाळी काळोख पडण्याच्या सुमारास त्याची सुमधुर शीळही खूप वेळा ऐकली.
शीळकरी कस्तुर
मुलं उशीरानेच उठली आणि हॉटेलचा छान परिसर पाहून खूष झाली. तिथे ज्यूनो नावाची एक पाळलेली कुत्री आहे. एकदम शांत आहे. तिच्याशी हळूहळू मुलांची दोस्ती झाली. रोजचा नाश्ता, जेवण अतिशय चवदार होतं. प्रवासामुळे बिघडलेलं पोटाचं कामही लवकरच रुळावर आलं.
आम्ही चक्राताला एकूण चार दिवस आणि पाच रात्री राहिलो. पहिल्या दिवशी आमच्याव्यतिरिक्त अजून फक्त एक जोडपं हॉटेलमध्ये उतरलं होतं. ते दुसर्या दिवशी चेकआऊट करून गेल्यावर तर फक्त आम्हीच उरलो. शेवटचे दोन दिवस मात्र मुलाबाळांसहित आलेली दोन कुटुंबं होती.
हॉटेलचा परिसर
एप्रिल महिना असूनही, भर दिवसासुद्धा हॉटेलच्या खोलीत चक्क थंडी असायची.
फरशी गार गार असायची. त्यामुळे खोलीत ठेवलेला टेबलफॅन कोण, कधी आणि
कशासाठी वापरत असावेत असा प्रश्न आम्हाला पडला!
’हल्की ठंड है, आप एक पतला सा जॅकेट रख दीजिये बस’ या हॉटेलमालकांच्या
बोलण्यावर विसंबून आम्ही थंडीसाठी फारसं काही नेलं नव्हतं. पण
त्यांच्यासाठी हलकी असलेली थंडी आम्हाला कुडकुडायला लावत होती. त्यामुळे
पहिल्या दिवशी संध्याकाळी तातडीने चक्राता मार्केटला जाऊन मुलांसाठी एकेक
जॅकेट घेतलं. तत्पूर्वी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला चक्राताजवळच्या चिलमिरी
नावाच्या ठिकाणी नेलं. उंचावर असलेलं विस्तीर्ण पठार अशा स्वरूपाची ही
जागा आहे. भणाणणारा वारा वहात होता. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही
सुंदर दिसतात असं तो म्हणाला. त्या दिवशी नाही, पण नंतर एक दिवस आम्ही इथे
येऊन सूर्यास्त पाहिला.
चिलमिरीहून दिसणारं दृश्य
तिथून दिसणारा सूर्यास्त
दुसर्या दिवशी टायगर फॉल्स या धबधब्याला गेलो. चालतही जाता येतं, पण आम्ही गाडीनेच गेलो. आमचा ड्रायव्हर स्कॉर्पियो गाडीसह या पूर्ण सहलीत आमच्याबरोबर होता. हिमालयातल्या रस्त्यांवर गाडी चालवणार्या चालकांमध्ये आढळणारे गुण, म्हणजे कौशल्य, प्रसंगावधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ’सेफ्टी फर्स्ट’ हा दृष्टिकोन त्याच्याकडे असल्यामुळे आमचे सगळे प्रवास उत्तम पार पडले. टायगर फॉल्सला जाणारा रस्ता त्यामानाने सोपा आणि चांगला आहे. गाडी थांबवून पुढे धबधब्यापर्यंत चालत गेलो. खरं तर त्या दिवशी रविवार, पण आम्ही तसे लवकर पोचल्यामुळे आम्ही सोडून तिथे फारसं कुणीच नव्हतं. पाणी बर्फासारखं थंड होतं. मी जेमतेम गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातच उतरले, पण मुलांनी मात्र भरपूर मज्जा केली. ती नखशिखांत भिजली. मी पाण्यात बुडवलेला पायाचा भाग जवळजवळ बधीर झाल्यासारखा वाटत होता. अर्धापाऊण तास मजा करून आम्ही बाहेर आलो. तिथे तिकिटं वगैरे तपासणारा एक स्थानिक माणूस होता, त्याने उत्साहाने धबधब्याच्या समोरच्या बाजूने वर चढून अजून उंचावरून धबधबा दाखवला. तोपर्यंत धबधब्यावर बरीच गर्दी झाली होती. मग आम्ही परत निघालो आणि जेवायला हॉटेलवर येऊन पोचलो.
टायगर फॉल्स
वाटेत दिसलेलं कांचनाचं फुललेलं झाड
संध्याकाळी आम्ही रस्त्यावर फिरायला निघाल्यावर हॉटेलच्या मॅनेजरने सांगितलं की इथे खाली जवळच ’किमोना फॉल्स’ नावाचा धबधबा आहे. एकदम सुंदर जागा आहे, तिथे जा. आम्ही त्याने सांगितलेल्या वाटेने, शिवाय अजून दोघातिघांना विचारून तो धबधबा शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण आम्हाला काही तो सुंदर धबधबा सापडला नाही! काळोख पडायला लागला होता त्यामुळे झाडीतून अजून फिरत बसण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी परत आलो. वाटेत वळणावर एक पहाडी तांबट (हिमालयन/ग्रेट बार्बेट) एका झाडावर बसून साद घालत होता, पण आम्ही जेमतेम तिथे पोचलो आणि तेवढ्यात एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजामुळे तो उडून गेला! याने नंतर बर्याच वेळा हुलकावणी दिली, पण आम्ही परत जाण्याच्या आदल्या दिवशी मात्र नीट दिसला.
आम्ही संध्याकाळी आमच्या ड्रायव्हरला परत बोलावलं होतं कारण आज चिलमिरीला जाऊन सूर्यास्त बघायचा होता. हॉटेलच्या परिसरात काळोख पडायला लागला असला तरी चिलमिरी उंचावर आणि उघड्यावर असल्यामुळे तिथे सूर्यास्ताला अजून तसा वेळ होता. त्याप्रमाणे ड्रायव्हर गाडी घेऊन आला. चिलमिरीला सूर्यास्त बघायला आलेले आमच्यासारखे बरेचजण होते. लांबच लांब पसरलेल्या पर्वतशिखरांच्या मागे दिसणारा सुंदर सूर्यास्त बघितला.
दुसर्या दिवशी सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही बुधेर गुंफांना
जाण्यासाठी निघालो. चक्रातापेक्षा हे ठिकाण जास्त उंचावर आहे. रस्ताही तसा
चांगला आहे. अर्थात वळणदार आणि चढणीचाच. वाटेत एका ठिकाणी थांबून एका
झर्याचं पाणी पिऊन आणि बाटल्यांमध्ये भरून घेतलं. आमचा ड्रायव्हर चांगला
होता, पण ही गाडी त्याच्या सवयीची नव्हती. त्यामुळे त्याची पाठ दुखत
असल्याचं त्याने आदल्या दिवशी सांगितलं होतं. बुधेर गुंफांपर्यंत चारपाच
किलोमीटर चढत जावं लागतं. मी जरी आधी एकदा जाऊन आले असले आणि वाट तशी सोपी
असली तरी, तरी आपण कुठे चुकणारच नाही, अशी खात्री मला नव्हती. त्यामुळे
चक्रधर आणि मार्गदर्शक अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर होती. पाठ दुखत असेल
तर तो कसा काय चढणार अशी शंका आम्ही बोलून दाखवल्यावर तो म्हणाला की
पाठदुखी आता कमी आहे, त्यामुळे मला चढायला जमेल. फक्त काल रात्री झोप नीट
झाली नाही, कारण आमच्या गावात काल बिबट्या आला होता!! आम्ही एकदम ’बापरे!’
केलं, तर म्हणाला की येतो कधीकधी बिबट्या गावात, बकर्या वगैरे न्यायला. पण
आम्ही हाकलतो. काल रात्रभर ओरडत होता.
त्याचं गाव आमच्या हॉटेलपासून एखाद्या किलोमीटरवरच होतं. आपल्यापासून
एवढ्या जवळ काल रात्रभर बिबट्या होता या कल्पनेने आम्हाला भीती वाटलीच आणि
काल टायगर फॉल्सला जाताना जंगलातून चालत गेलो नाही ते बरं झालं असाही विचार
मनात आला. बिबट्या जरी शक्यतो दिवसा दिसत नसला तरी काय झालं?
रस्त्यात एका ठिकाणी बुरांशच्या फुलांचं झाड जवळ होतं, तेव्हा आम्ही त्याला तीनचार फुलं काढून देण्याची विनंती केली. त्यानेही लगेच कडेच्या दरडीवर चढून फुलं काढून दिली. तजेलदार लालभडक रंगाची ही फुलं छानच दिसतात.

होता होता बुधेर गुंफांची वाट जिथून सुरू होते, त्या पायथ्याशी पोचलो. हे शेवटचे सहासात किलोमीटर्स जरा कठीणच आहेत. रस्ता अरुंद, वळणावळणांचा आणि खराब. इथेच एका ठिकाणी आम्हाला बर्फ दिसला. ऊन फारसं पडत नाही, अशा जागी साठून राहिलेला होता. खाली उतरून थोडा बर्फ हातात उचलून आणला. मी आणि मुलांनी पहिल्यांदाच असा बर्फ बघितल्यामुळे आम्हाला मजा वाटली. तो ठिसूळ आणि कुरकुरीत होता, पण सहजासहजी वितळत नव्हता.
पायथ्याशी पोचलो तेव्हा अकराचा सुमार होता. आधी वर चढून परत खाली येऊ
आणि मग सोबत आणलेलं जेवण जेवू असं ठरवलं. तिथे खाली वन खात्याचं एक
विश्रामगृह आहे. बाहेरच्या बाजूला काही काम सुरू होतं. तिथे एक कुत्राही
होता. आम्ही चालायला लागलो, तसा तोपण आमच्याबरोबर आला.
वाटेत अधूनमधून थांबत दीडेक तासात आम्ही वर पोचलो. चढ अगदी सलग असा खूप नाही, पण तसा
बर्यापैकी चढ आहे. पण पूर्ण वाट देवदारांच्या जंगलातून जात असल्यामुळे ऊन अजिबात लागत नाही.
वर पोचल्यावर लहानमोठे उंचवटे आहेत, त्यावर सगळीकडे हिरवं गवत आहे. तिथे
झाडं अजिबातच नाहीत. त्यातल्याच एका मोठ्या उंचवट्यावर एक देऊळ आहे. त्या
देवळाचा एक उत्सव दोन तीन दिवसांनी सुरू होणार होता, त्याची तयारी सुरू
होती. ’बिसू’ नावाचा सण आहे असं ड्रायव्हर आणि बाकीच्या माणसांच्या
बोलण्यातून कळलं. आसामात ’बिहू’ असतो, केरळमध्ये आणि कर्नाटकात ’विशू’
असतो, तुळू लोकांचाही ’बिसू’च असतो.
तिथे पोचल्यावर आम्ही बुधेर गुंफा पहायला पुढे गेलो आणि तेवढ्यात आमच्या ड्रायव्हर कम गाईडने एक झोप काढली! गुंफांपर्यंत पोचलो खरे, पण आत जावंसं वाटलं नाही, कारण गुहेच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात माश्या उडत होत्या. सकाळी हॉटेलवरही असा सल्ला मिळाला होता की शक्यतो गुहेत जाऊ नका, गेलात तरी सगळ्यांनी एकाच वेळी आत जाऊ नका. या गुहा आतमध्ये बर्याच लांबलचक पसरलेल्या आहेत. पण सगळा भाग अजून कुणी फिरून पाहिलेला नाही.
थोडा वेळ सावलीत विश्रांती घेऊन आम्ही खाली उतरायला लागलो. उतरताना अर्थातच भराभर उतरलो आणि लगेचच खाली पोचलो. हात-तोंड धुवून तिथल्या एका शेडमध्ये जेवायला बसलो. डाळ-भात-दही-सॅलड असं छान जेवण होतं. पण भरपूर प्रमाणात माश्या होत्या आजूबाजूला! शेवटी एकदाचं जेवण झालं. वर जाताना जो कुत्रा आमच्या सोबत आला होता, तो वरच थांबला होता. आमचं जेवण होता होता तो एकदम धावत धावत येऊन पोचला. त्यालाही भूक लागली असणारच. उरलेला सगळा डाळभात त्याला एका पानावर वाढला आणि त्याने तो पाच मिनिटांत संपवून टाकलासुद्धा!
आम्हीही मग तिथून निघालो. मागच्या वेळी किकांबरोबर शिबिराला आलो असताना पहिल्या दिवशी ज्या ’कोटी कनासर’ या ठिकाणी गेलो होतो, ते ठिकाण मी यावेळी यादीत घेतलं नव्हतं. पण ती जागा बुधेरपासून जवळ आहे असं सकाळी हॉटेलवर समजलं आणि त्यामुळे तिथेही जायचं ठरवलं. त्याप्रमाणे बुधेरहून कोटी कनासरला पोचलो. तिथे एक खूप जुनं आणि खूप मोठं देवदाराचं झाड आहे. एक शंकराचं लहानसं घुमटीवजा देऊळ आहे. मागच्या वेळी शांत, स्वच्छ असणारी ही जागा, यावेळी मात्र गजबजलेली आणि अस्वच्छ होती! मोकळ्या जागेत क्रिकेटचा खेळ चालू होता. देवळाच्या आणि झाडाच्या आसपास वेफर्स-कुरकुरे आणि तत्सम वस्तूंच्या प्लॅस्टिकच्या पाकिटांचा कचरा पडलेला होता. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूलाही अगदी डायपर्सपासून विविध प्रकारचा कचरा होता. तीन वर्षांमध्ये एवढा बदल झालेला बघून वाईट वाटलं. तिथे खरं म्हणजे कचरापेट्याही आहेत. तरीही कचरा असा उघड्यावर का टाकून देत असतील लोक? ही नेमकी काय प्रवृत्ती असते माणसाची, जी सुंदर ठिकाणांना कुरूप बनवते? कधी कचरा टाकून, कधी आपापली नावं कोरून.
तिथे मग फार वेळ न थांबता हॉटेलवर परत आलो. चहा वगैरे पिऊन मग नेहमीप्रमाणे खाली रस्त्यावर चालत एक चक्कर मारली. परत आलो तेव्हा व्हर्डिटर फ्लायकॅचर नावाचा अतिशय सुंदर दिसणारा छोटासा निळा पक्षी, खरं तर त्यांची जोडी, बराच वेळ दिसली. दुर्बिणीतून खूप वेळ त्यांना पाहिलं. भरपूर फोटो काढले.
काळोख पडता पडता दोन गाड्यांमधून दोन कुटुंबं आली. तेही बंगलोरचेच होते. मूळचे हैदराबादचे. आपण जिथे रहात असतो, तिथल्या माणसांच्या दिसण्याची, वागण्याबोलण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण त्या त्या ठिकाणच्या माणसांची, स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. सांगायची म्हटली तर कदाचित सांगता येणार नाहीत, पण दिसली की लगेच लक्षात येतात. तसे हे टिपिकल बंगलोरवासी होते. आम्हीही त्यांना तसेच वाटलो, की आमच्यावर अजूनही मराठी छाप जास्त आहे, हे सांगता येणार नाही. ’गाववाले’ भेटल्यामुळे चांगल्या गप्पा झाल्या. दुसर्या दिवशी ते बुधेर गुंफा आणि टायगर फॉल्स अशी दोन ठिकाणं करणार होते. आम्ही देवबन आणि खडांबाला जाणार होतो.
हे काही पक्षी
grey-headed canary flycatcher
टकाचोर
हिमालयन बुलबुल
हिमालयन गिधाड
russet sparrow
streaked laughingthrush
व्हाईट थ्रोटेड फॅनटेल (नाचण)
हाही तोच आहे.
https://www.maayboli.com/node/81819
बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.
आम्ही नेहमीप्रमाणे नाश्ता वगैरे करून नऊ-साडेनऊला देवबनला जाण्यासाठी गाडीत बसलो. हा रस्ता बुधेरपेक्षा वेगळ्या दिशेला जातो. चढण आणि वळणं तर अपरिहार्यच, पण रस्ताही खूपच खडबडीत आहे. मधे एका ठिकाणी सैन्याची प्रशिक्षणाची छावणी आहे. तिथून बरंच पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटतात. एक देवबनला जातो आणि दुसरा खडांबाला. आधी देवबनला गेलो. गाडीतून उतरून व्यासशिखरावर चढायला सुरुवात केली. बुधेरच्या मानाने ही चढाई खूपच कमी आहे. इथेही देवदार वृक्षांची सावली आहेच. तिथे दोनतीन गायी चरत होत्या. इथे देवदारांचे बरेच ’कोन्स’ मुलांनी गोळा केले.
वाटेत विविध प्रकारची फुलं दिसली.
१
२
३
४
व्यासशिखरावर पोचलो. तिथे सावलीसाठी एक घुमटी बांधलेली आहे. इथून लांबवरची, नंदादेवी, बद्रिनाथ, केदारनाथ अशी बरीच शिखरं दिसतात. पण त्यासाठी हवा स्वच्छ असावी लागते. गेल्या वेळेस आणि याही वेळेस हवा स्वच्छ नसल्यामुळे मला काही ही शिखरं बघण्याचं भाग्य मिळालेलं नाही.
तिथे बसून जरा वेळ विश्रांती घेतली. त्या घुमटीच्या छपराच्या आतल्या बाजूवर लोकांनी आपापली नावं कोरून ठेवलेली आहेत. तिथे बाहेर एका खांबावर संगमरवरी फरशी बसवलेली आहे आणि त्या फरशीवर एक संस्कृत श्लोक कोरलेला आहे. व्यासांची स्तुती करणारा हा श्लोक आहे. पण त्या फरशीवरसुद्धा लोकांनी दगडांनी रेघोट्या कोरल्या आहेत.
तिथे बसून, लाडू खाऊन, पाणीबिणी पिऊन आम्ही खाली उतरलो. उतरताना काही छोटे छोटे पक्षी दिसले. त्यातला ग्रे-हेडेड कॅनरी फ्लायकॅचर हा पक्षी आम्हाला हॉटेलजवळसुद्धा दिसला होता. बाकीचे पक्षी नीट दिसले नाहीत. खाली येऊन डब्यातून आणलेलं जेवण जेवलो. इथेही माश्यांनी बराच त्रास दिला.
जेवण झाल्यावर थोड्या वेळाने गाडीत बसून आम्ही खडांबाला जायला निघालो.
तिकडे ’लॅमरगियर’ नावाचं गिधाड दिसेल, अशी आम्हाला आशा होती. गेल्या वेळेस
हे गिधाड आम्हाला छान दिसलं होतं. डावीकडच्या डोंगरामागून ते गिधाड उडत आलं
होतं, पायात धरून आणलेलं हाड त्याने खालच्या कातळावर टाकून फोडलं , मग ते
खाली उतरलं आणि त्याने ते हाडांचे तुकडे खाल्ले होते. या वेळेसही हे सगळं
दिसावं, अशी आमची इच्छा होती.
’खडांबा’ म्हटलं, तरी प्रत्यक्षात खडांबापर्यंत जायची गरज नव्हती. जिथे
जायचं होतं, ती जागा खडांबाच्या आधीच वीसेक किलोमीटरवर होती. एका वळणावर
मला आठवलं, की हीच ती जागा, जिथे आम्ही गेल्या वेळेस बसलो होतो. पण शंका
नको म्हणून मी गेल्या वेळेस काढलेला या दरीचा फोटो शोधला. खाली खोल दरीत
दिसणारी घरं, बाकीचं दृश्य जुळलं. जागा बरोबर होती. रस्त्याच्या डाव्या
बाजूला उंच कडा, उजवीकडे खूप खोल दरी. अशा या रस्त्यावर मधूनमधून
रस्त्याच्या कडेला मुद्दाम जरा मोकळी सपाट जागा ठेवलेली असते. समोरासमोर
दोन वाहनं आली, की गरज पडली तर या जागेचा उपयोग गाडी बाजूला घेण्यासाठी
करता येतो. अशा मोकळ्या जागेवर आम्ही थांबलो आणि लॅमरगियरची वाट बघत बसलो.
पण छे, बराच वेळ थांबलो तरी लॅमरगियर काही आलं नाही. गेल्या वेळेस आलेलो असताना आम्ही आठजण आणि शिवाय दोन ड्रायव्हर, असे दहाजण होतो. शिवाय किकांसारखी अनुभवी व्यक्ती सोबत होती. पण आत्ता आम्ही चौघं आणि एक ड्रायव्हर, एवढेच. किती वेळ थांबायचं हा प्रश्न होताच. शेवटी तासभर थांबलो आणि लॅमरगियर काही दिसत नाही, असं म्हणत नाईलाजाने परत निघालो.
येतानाची वाट त्या मानाने लवकर सरली आणि वेळ होता म्हणून आम्ही चक्राता मार्केटला जाऊन मोमो खायचं ठरवलं. चविष्ट मोमोज खाल्ले. बाजारातून थोडा राजमा खरेदी केला. बुरांशचं सरबत, म्हणजे आपण जसं कोकम सरबताचं सिरप तयार करतो, तसं बुरांशचं सिरप मात्र बाजारातून न घेता ड्रायव्हरच्या ओळखीच्या एका मुलाकडून उद्या घेऊ, असं ठरवलं. प्रत्यक्षात मात्र ऐन वेळी तो मुलगा ठरलेल्या जागी उगवलाच नाही, त्याचा फोनही लागला नाही. त्यामुळे दुसर्याच एका माणसाकडून ते सरबत आम्ही घेतलं.
आता हॉटेलमध्ये परत आल्यावर ’बॅगा भरणे’ हे काम होतं. ते पार पाडलं. दुसर्या दिवशी सकाळी नऊसाडेनऊला निघायचं होतं. बंगलोरचे पाहुणेही त्याच दिवशी निघणार होते. ते लवकरच निघाले. आम्हाला तशी काही घाई नव्हती कारण डेहराडूनहून दिल्लीला जाण्याची ट्रेन संध्याकाळी पाच वाजता होती. इथून डेहराडूनला दुपारी पोचून, तिथे जेवून मग रेल्वे स्टेशनवर जाऊन बसायचं, असं ठरवलं होतं. आम्ही नाश्ता करून मग निघालो.
चक्राता सोडताना वाईट वाटत होतंच. हा सुंदर परिसर आणि देवदारांचा सुगंध सोडून पुन्हा गजबजलेल्या जगात जायला नको वाटत होतं.
ही हॉटेलच्या परिसरातली काही फुलं.
ही र्होडोडेंड्रॉन, म्हणजे बुरांशची फुलं आहेत.
डेहराडूनहून येताना बराच वेळ लागला असला, तरी आत्ता परत जाताना त्या मानाने लवकर पोचलो. फारशी भूक लागली नव्हती. हाताशी वेळ आहे, म्हणून डेहराडूनची सुप्रसिद्ध फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघूया असं ठरवलं. चक्राताकडून डेहराडूनमधे पोचण्याच्या रस्त्यावरच ही इन्स्टिट्यूट आहे. तिथे बाहेर तिकिटं काढून आत गेलो. ह्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉरेस्ट्री (वनविद्या) या विषयावर पदवी आणि डॉक्टरेटचं शिक्षण दिलं जातं. तब्बल २००० एकर जमीन त्यांच्याकडे आहे. एक बॉटॅनिकल गार्डन आहे, पण तेव्हा ते बंद होतं. आम्ही मुख्य इमारतीतली संग्रहालयं तेवढी बघितली. एकूण पाच की सहा आहेत, त्यापैकी तीन पाहिली.
या संस्थेची इमारत फार छान आहे. ब्रिटिश काळातली आहे. लाल रंगाच्या भिंती आणि घुमट असलेले कमानदार छतांचे लांबच लांब व्हरांडे.
१
२
संस्थेचा परिसरही सुंदर आहे.
एका भिंतीवरील कलाकृती
आम्ही पाहिलेल्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय जंगलातल्या झाडांना
होणारे विविध रोग आणि त्यासाठी कारणीभूत असणारे जीवाणू-बुरशी वगैरे, या
विषयावर होतं. अशा रोगांमुळे खराब झालेले लाकडाचे नमुने तिथे ठेवलेले आहेत.
दुसर्या संग्रहालयाचा विषय ’टिंबर (लाकूड)’ हा होता. भारतात विविध
कारणासाठी वापरल्या जाणार्या लाकडांचे नमुने होते, ती झाडं कुठल्या
प्रदेशात उगवतात हे नकाशावर दाखवलेलं होतं. भरपूर प्रकारच्या लाकडांचे
नमुने (प्रत्येकी एक पॉलिश न केलेला आणि एक पॉलिश केलेला) बघायला मिळाले.
इथेच एका ७०० वर्षं वय असलेल्या देवदार वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद घेऊन
ठेवलेला आहे. १९१९ साली या झाडाचं आयुष्य संपलं. तेव्हा त्याच्या खोडावर
दिसणार्या वलयांवरून त्याचं वय ७०४ वर्षांचं असावं असं ठरवलं गेलं. या
आडव्या छेदावर केंद्रापासून ते बाहेरच्या कडेपर्यंत अनेक समकेंद्री वर्तुळं
दिसतात. त्यापैकी अधल्यामधल्या वर्तुळांवर त्या त्या वर्षी घडलेल्या ठळक
घटना नोंदवलेल्या आहेत. कुतुबमिनारच्या उभारणीपासून सुरुवात करून ते
जालियनवाला बागेतल्या हत्याकांडापर्यंत घटना आहेत. केवढा मोठा कालपट! हे
संग्रहालय मला खूपच आवडलं. (तिथे आत फोटो काढू देत नाहीत. पण गूगल केल्यावर
या खोडाचा फोटो पहायला मिळतो.)
तिसरं संग्रहालय ’सिल्विकल्चर’ या विषयावर होतं. जंगलांचे प्रकार,
भूगोलानुसार ते कसे बदलतात, ते नकाशांवर दाखवलेलं आहे. हे नकाशे
’इंटरॅक्टिव्ह’ आहेत, म्हणजे नकाशासमोर वेगवेगळी बटनं आहेत. आपण समजा
’पानझडी’ असं लिहिलेलं बटन दाबलं, तर भारतात जिथे जिथे पानझडी जंगल आहे,
त्या त्या ठिकाणी नकाशात दिवे लागतात.
हेही संग्रहालय आम्हाला आवडलं.
आता भूकही लागली होतीच आणि फिरून फिरून आम्ही दमलोही होतो. त्यामुळे
जेवायला गेलो. जेवून मग रेल्वे स्टेशनला गेलो. ड्रायव्हरला निरोप दिला.
चारपाच दिवस त्याच्याबरोबर प्रवास करून आमची चांगली ओळख झाली होती.
चांगल्या गप्पा झाल्या होत्या.
स्टेशनमध्ये शिरताच समोर आमची शताब्दी एक्स्प्रेस उभीच होती. गाडी
सुटायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे डब्यात फारसं कुणी आलेलंच नव्हतं.
मला उगाचच त्यामुळे ’ही नक्की आपलीच गाडी आहे ना?’ अशी शंका यायला लागली.
शेवटी मी परत एकदा बाहेर जाऊन गाडीवरचं नाव आणि नंबर, यांची खात्री करून
घेतली.
गाडी बरोब्बर पाच म्हणजे पाच वाजता सुटली! रात्री अकराला दिल्लीला पोचलो.
दुसर्या दिवशी दिल्लीला दिवसभर हॉटेलमध्ये थांबून संध्याकाळी शहरात थोडं फिरण्याचा विचार होता. कारण चक्राताच्या थंडीतून आम्ही दिल्लीच्या उन्हाळ्यात येऊन पडलो होतो! त्यामुळे दिवसा उन्हातून फिरण्याची इच्छा अजिबात नव्हती. त्याप्रमाणे संध्याकाळी निघालो. इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या परिसरात पोचलो.
नक्की आवर्जून जाऊन बघावं असं हे स्मारक बांधलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक योद्ध्याचं स्मरण इथे केलेलं आहे. सुरुवातीला परमवीर चक्र मिळालेल्या वीरांचा विभाग आहे. युद्धाच्या काळात असामान्य शौर्य गाजवलेल्या योद्ध्यांना परमवीर चक्र दिलं जातं. प्रत्येक योद्ध्याचा छोटा पुतळा (बस्ट), त्या त्या लढाईची आणि त्यांनी गाजवलेल्या शौर्याची थोडक्यात माहिती, असं स्वरूप आहे. गुलाबाच्या, मोगर्याच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या फुलझाडांनी हा सगळा परिसर सुशोभित केलेला आहे.
तिथून बाहेर पडून मग आतल्या बाजूला, म्हणजे युद्धस्मारकाच्या केंद्राच्या भागात गेलो. इंडिया गेटजवळ असणारी अमर जवान ज्योत आता इथल्या ज्योतीत विलीन केली आहे. या केंद्राच्या भोवती अनेक वर्तुळाकार भिंती बांधलेल्या आहेत. या सर्व भिंतींवर १९४७ पासून ते आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलं आहे, त्या असंख्य सैनिकांची नावं कोरलेली आहेत. भारताच्या कानाकोपर्यातल्या या सैनिकांची नावं वाचताना खूप वाईट वाटतं. सैनिक युद्धाला कारणीभूत नसतात. युद्धाला कारणीभूत असणार्या चुका वेगळ्याच माणसांच्या असतात. पण प्राण जातात सैनिकाचे.
काळोख पडायची वेळ जवळ आली होती. इथे रोज एक कार्यक्रम असतो. रोज एका-एका हुतात्मा सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते ( पत्नी येऊ शकत नसल्यास कदाचित मुलांना, नातवंडांना बोलावत असतील) अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र वाहिलं जातं. आम्ही गेलो त्या दिवशी १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या एका हरियानाच्या सैनिकाच्या सहधर्मचारिणीच्या हस्ते हा कार्यक्रम होता. लष्करी शिस्तीत तो कार्यक्रम पार पडला. सत्तर-पंच्याहत्तर वय असणार्या त्या आजी व्हीलचेअरवर आल्या होत्या. जेव्हा त्यांच्या पतीची लढाईतली कामगिरी माईकवरून सांगितली जात होती, तेव्हा त्यांना भावना अनावर झाल्या. आमच्यासारख्या प्रेक्षकांची बरीच गर्दी होती. टाळ्या न वाजवण्याची कडक सूचना होती. कार्यक्रम संपताना तिन्ही दलांचे झेंडे खाली उतरवले गेले.
या ठिकाणी एक गोष्ट प्रचंड खटकली. ती म्हणजे, आपण जिथे आलो आहोत, त्या जागेचं गांभीर्य न ठेवणारे पर्यटक! मी रायगडाबद्दल लिहितानाही हे लिहिलं होतं. राष्ट्रीय युद्ध स्मारक ही हसरे सेल्फी काढण्याची जागा नाही, नसली पाहिजे. या बाबतीत खरोखरच काहीतरी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे असं मला वाटतं. काही काही देवळांमध्ये, उदा. जगन्नाथपुरीला देवळाच्या परिसरात कॅमेरा, मोबाईल न्यायलाच बंदी आहे. तिथे आपण तो नियम पाळतोच ना? मग राष्ट्रीय युद्ध स्मारकासारख्या ठिकाणीही असा काही तरी नियम केला पाहिजे, ज्यामुळे हा थिल्लरपणा कमी होईल. सेल्फी काढण्यासाठी इतर अनेक जागा असतात. सेल्फीच असं नाही, तर तिथे वावरतानाची शिस्त न पाळणं (जिथे बसू नका असं स्पष्ट लिहिलेलं आहे तिथे बसणं वगैरे) हेही खटकतं. तिथे असलेले सुरक्षा कर्मचारी शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात.
असो.
रात्री कनॉट सर्कलला थोडा वेळ भटकलो. जेवलो. हॉटेलला येऊन झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी चेकआऊट करून विमानतळावर गेलो. तिथेच जेवलो. संध्याकाळी पुण्याला पोचलो.
येताना दिसलेला चंद्र.
चक्राता पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा ऑक्टोबर महिना होता. वेगळ्या ऋतूत तिथे परत एकदा जाऊन तिथला निसर्ग आणि पक्षी बघण्याची माझी इच्छा होतीच. ती पूर्ण झाली. अर्थात, एकटीने कॅंपला जाणं वेगळं आणि कुटुंबासोबत जाणं वेगळं. ’फोकस’ निश्चितच बदलतो. पण एकटीने गेलेली असताना पाहिलेले सुरेख पक्षी, तिथला निसर्ग हा घरच्यांसोबत परत पहावा असंही वाटत होतंच. मुलांनाही हा अनुभव खूपच आवडला. नवर्यालाही चक्राता खूप आवडलं. त्यांनाही तिथे पुन्हा जावंसं वाटतंय याचा अर्थ सहल सुफळ संपूर्ण झाली.
https://www.maayboli.com/node/81824
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.