गाभा:
तिरुपती - एक पर्यटन
आमची बरीच भटकंती सुरू असते त्यावरून नेहमी विचारणा होते की तिरुपतीला गेलात का? मग ठरवून टाकलं की करोना संपला की तिरुपती बघू. धार्मिक ठिकाणं म्हटली की गणपतीनंतरचा पितृपंधरवडा चांगला काळ असतो कारण गर्दी नसते. पण बालाजी वेंकटेशाच्या दर्शनासाठी जाणारच नाही तर या वेळी ठरवलं की नवरात्रात जाऊ. आणखी पुढे नेलं तर दिवाळी. मग नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये दुसरा पावसाळा इकडे सुरू होतो. शिवाय एकच एक ठिकाण ठरवून तीन चार दिवसांचे पर्यटन करणे धोक्याचे असते. याबरोबर तमिळनाडूतील कांचिपूरम, महाबलीपुरम ही जोडलं. कुठे काही संप, बंद,पाऊस झाला तर इतर ठिकाणे हात देतील. तमिळनाडूतला पावसाळा तर ओक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये. मग नवरात्रात जाण्याचं नक्की केलं आणि तिरुपतीची माहिती काढायला सुरुवात केली.
काही लोक दरवर्षी तिरुपतीला जाणारे आहेत पण आम्ही प्रथमच जात आहे म्हणजे अगदी नवखे.पूर्वीच्या आंध्रप्रदेशात अगदी दक्षिणेकडे तिरुपती आहे. नंतर आंध्रप्रदेशचे दोन भाग झाल्यावरही आंध्रातच राहिले. जुनी राजधानी हैदराबाद ही नवीन तेलंगण राज्यात गेली. हा आइटीक्षेत्राचा विशेष भाग मिळाला तरी तिरुपतीसारखे श्रीमंती धार्मिक ठिकाण गेल्याने तेलंगणास दु:खच झाले. ते आता दुसरे एक धार्मिक ठिकाण बांधून भाविक खेचणार आहे. मोठा निधी दिला आहे.
तिरुमला/तिरुमलै (तिरु =श्री ,मलै=पर्वत) हे स्थान कसे निर्माण झाले याविषयी पुराणांमध्ये अनेक आख्यायिका आहेत.
कथा पहिली
विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. एकदा प्रलय होऊन पृथ्वी बुडाली तेव्हा विश्वाचा तारणहार विष्णू याने श्वेत वराहाच्या रूपाने येऊन पृथ्वीस सागरातून वर आणले आणि या पर्वतावर विश्रांती घेतली. त्यामुळे या स्थानास श्री वराह स्वामी क्षेत्र म्हणू लागले. किंवा आदि वराह क्षेत्र.
कथा दुसरी
वैकुंठाला सुखी स्थानाचा कंटाळा येऊन विष्णूने नारदमुनीस विचारले की दुसरी कोणतीतरी जागा सुचवा. तेव्हा नारदमुनीने शेषाचलम ही जागा सुचवली. शेषाचे सात फणे म्हणजे इथली सात शिखरे होत. तिरुमलैला शेषाचलमही म्हणतात.
कथा तिसरी
एकदा ऋषिमुनींनी एक मोठा यज्ञ करायचे ठरवले पण यज्ञ देवता कोण असावी यावर त्यांचे एक मत होईना. मग भृगू ऋषी म्हणाले की मी घेऊन येतो एका देवाला. प्रथम ब्रह्माकडे गेले तर त्यांच्या तीनही तोंडांनी लक्षही दिले नाही. मग भृगू गेले कैलासावर महादेवाला बोलवायला. पण महादेव पार्वतीशी बोलण्यातुन गुंग होते. मग पोहोचले वैकुंठाला. महाविष्णू लक्ष्मीची बोलण्यात मग्न. भृगूला आला राग. त्याने विष्णूच्या छाताडावर मारली लाथ. विष्णू जागे होऊन पाहतात तर समोर संतापलेले भृगू. विष्णूने भृगूची करुणा भाकली, पाय धरले आणि आपल्या पायाला लागले तर नाही ना विचारले. भृगुला आली विष्णूची दया आणि क्षमा केली. पण लक्ष्मीची आश्रय स्थान असलेल्या जागीच लाथ बसूनही विष्णूने काहीच केले नाही म्हणून लक्ष्मी वैकुंठ सोडून करवीर क्षेत्री म्हणजे कोल्हापुरात येऊन राहिली. ( रेल्वेने यांची नोंद घेऊन कोल्हापूर ते तिरुपती अशी हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू केली आहे.) तिकडे वैकुंठाला विष्णूला कंटाळा आला आणि तो नारदाच्या सुचवणीनूसार शेषाचलम पर्वतावर येऊन एका मुंग्यांच्या वारुळात 'श्रीनिवास' रूपात राहिला. म्हणून हे तिरुमलै श्रीनिवासम क्षेत्र. पुढे लक्ष्मिला आपल्या पतिदेवाची काळजी लागून एका गायीला तिथे घेऊन फिरू लागली. त्या वारुळापाशी येऊन ती पान्हा सोडत असे. ही गाय तिथल्या एका राजाला देऊन लक्ष्मी कोल्हापुरात परतली तरी गाय आपले काम करतच राहिली. राजाच्या गुराख्याने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली तेव्हा राजाने गायीला काठीने मारले. श्रीनिवास तिथून बाहेर आले आणि गायीच्या अंगावरचे काठीच्या माराचे वळ त्यांच्या देहावर पाहून राजा वरमला आणि क्षमा मागू लागला. मग विष्णूने त्यास सांगितले की ठीक आहे तुझ्या वंशाच्या एका राजास मुलगी होईल तेव्हा तिच्याशी लग्न करेन. तर तो राजा आकाश राजा आणि त्याची मुलगी पद्मावती. आणखी एका आश्वासनाने कृष्णाचा प्रतिपाळ करणाऱ्या यशोदेला विष्णूने वचन दिलेले की मी तुला पुढे एकदा दिव्य दर्शन देईन. त्याप्रमाणे यशोदा ही सांप्रत काळी वकुळादेवी म्हणून अवतरली. ती या 'श्रीनिवासाचे' स्थळ घेऊन आकाश राजाकडे पद्मावतीसाठी मागणी घालायला गेली. आणि श्रीनिवासाचे पद्मावतीशी लग्न झाले. (या पद्मावतीचे देऊळ तिरुपती गावापासून पाच किमी.वर कांचिपुरम रस्त्यावर आहे. )
एकूण तिरुमला/तिरुपती माहात्म्य पुराणांत आहे. आताच्या श्रीनिवास/ वेंकटेशा यापेक्षा वराह अवताराचे स्थान म्हणून आद्य आहे.
फोटो १
वराह स्वामी पुष्करणी, तिरुमलै
पुराणांत विविध पवित्र क्षेत्र आणि स्थानांचा उल्लेख असला तरी देऊळ ही कल्पना बहुधा थोडी उशिरा आली असावी.
तिरुमला आणि तिरुपती येथील देवळे
ऐतिहासिक आढावा.
पाचव्या शतकात पल्लव राजांनी ही देवळे बांधली. नंतर चोल राजांनी त्यात भर घातली. सोळाव्या शतकात विजयनगरच्या राजांनी त्यास गढी बांधून ,उंच गोपूरे बांधून भव्य दिव्य केलं.
अकराव्या शतकानंतर हिंदु राजांच्या राजवटी संपून मुसलमान,मोगल,ब्रिटीश राजवटी आल्या. देवळांची तोडफोड इकडे झाली नाही. ब्रिटिशांनी धार्मिक कार्यक्रमांतून बाजूला झाल्यावर या देवळांची व्यवस्था हाथीरामजी मठास सोपवण्यात आली. ती १८४३ ते १९३३ नव्वद वर्षे पाहात होते. नंतर देवस्थान कमिटी निर्माण केली गेली. १९८७ मध्ये सर्व कारभार आंध्र प्रदेश सरकारकडे गेला. त्यांनी मंडळावर कमीतकमी तीन आइएएस अधिकारी नेमले. ते धार्मिक सुसुत्रता,स्वच्छता, पर्यटन,सुरक्षा पाहतात. ( ते तिथे गेल्यावर लगेचच जाणवते.)
कुठे राहावे
याविषयी यूट्यूबवर खूप विडिओ आहेत. ते पाहून एक लक्षात आले की इतर शहरांत जशी हॉटेल्स आणि रेस्टारो आहेत तशी इथेही भरपूर आहेत पण देवस्थान कमिटीच्या निवासाची व्यवस्था पाहून ठरवून टाकले की एक दिवस तरी ( एकच दिवस खोली मिळते) या खोलीत राहून अनुभव घ्यायचाच. तो घेण्याचा योग आला आणि तिथली स्वच्छता आणि अगत्य पाहून तिथेच देव भेटला.
देवस्थानच्या रुमस बुकिंग विषयी.
आणि दर्शन पास.
देवस्थानच्या वेबसाइटवरून ( https://tirupatibalaji.ap.gov.in/ )ऑनलाईन रूम्स बुकिंग करता येते पण ते लवकर भरते. या रूमस 'श्रीनिवासम कॉम्प्लेक्स' ( बस स्टेशनजवळ,समोर) या इमारतीत असतात. आगावू बुकिंग न मिळाल्यास तिरुपती स्टेशनजवळच्या 'विष्णू निवासम' मध्ये करंट/ऑफलाईन बुकिंग होते. यासाठी राहणाऱ्या सर्वांना तिथे हजर राहून आधार कार्डस द्यावी लागतात. रूमचे भाडे रोखीने घेत नाहीत. कार्ड पेमेंटच करावे लागते. ( साधी नॉन एसी रु३४०,एसी ५००,डिलक्स ८००.)फक्त २४ तासांसाठी रूम मिळते. गर्दी नसल्यास दुसरे दिवशी आणखी २४तास इक्स्टेन्शन मिळू शकते. पण अगोदरच दोन दिवसांचे बुकिंग मिळत नाही. नियम बदलतात. खासगी हॉटेल्स तीन बेडचे १३०० रु घेतात,एसी रु दोन ते अडीच हजार १८टक्के टॅक्ससह. एकदम दोन तीन दिवसांसाठी रुम घेता येते हा फायदा. तिरुपतीमधल्या हॉटेलवर सर्व लगेच ठेवून फक्त एक लहान बॅग घेऊन तिरुमला'ला जाऊन येणे सोयीचे पडते.
दर्शनाचे तीन प्रकार आहेत.
१)दिव्य दर्शन - हे अलिपिरी फुटपाथ उर्फ सोपान वरून ३५०० पायऱ्या चढून तिरुमला'ला येतात त्यांना थेट दर्शन मिळण्याची सोय आहे. एक लाडू प्रसाद फुकट मिळतो.
२)सर्व दर्शन - फ्री. पण कितीही वेळ लागू शकतो.
३) स्पेशल दर्शन तिकिट - हे रुपये तिनशे भरून ऑनलाईन बुकिंग
https://tirupatibalaji.ap.gov.in/ या साइटवर होते. थोडे लवकर दर्शन होते. बुकिंग पुढच्या महिन्याचे अगोदरच्या महिन्याच्या पंधरा तारखेस उघडते. पण ते अर्ध्या तासात संपते.
या सर्व दर्शनाचे मिळून साधारणपणे वीस तासांत ऐंशी हजार लोकांना दर्शन मिळते.
कसे जावे
इथून बेंगळुरू केंपेगौडा विमानतळ २४० किमी.
चैन्नई विमानतळ १३० किमी आहे. सोयीचा.
रस्त्याने - सर्व मुख्य शहरांना जोडले आहे. रेल्वेचे तिरुपती स्टेशन गावातच आहे. रेनिगुंटा हे स्टेशन मुंबई -चेन्नई या मेन लाईनवर दहा किमी दूर आहे. तिरुपती -रेनिगुंटा -श्री कालाहस्ती या मार्गे खासगी आणि राज्यपरिवहनाच्या बसेस दर दहा मिनिटाला असतात. थेट टॅक्सीही आहेतच.
फोटो २
तिरुपती रेल्वे स्टेशन परिसर
याविषयीचे यूट्यूबवरचे विडिओ पाहून तिरुपतीमधून तिरुमाला पर्वतावर कसे जाता येते याची पूर्ण माहिती मिळाली. अल्लीपिरी सोपान मार्गे पायी चढून जाणाऱ्यांना विशेष महत्त्व दिले आहे. माझा तसेच करण्याचा विचार होता पण मी एकटा नव्हतो म्हणून बेत रद्द केला. तसा तिरुमला फार उंचावर नाही. ८२०मिटरस आहे, म्हणजे माथेरानपेक्षा शंभर मिटरस जास्ती. मध्यंतरी करोना काळात वरती गर्दी होऊ नये म्हणून एक नियम करण्यात आला होता. तुमच्याकडे दर्शन पास/तिकिट असल्याशिवाय बसने/वाहनाने वर जाऊ देत नव्हते. आता तो नियम काढला आहे. वर जाताना वाटेत लगेजची तपासणी केली जाते. पाण्याच्या वन-टाईम-यूस प्लास्टिक बॉटल्स नेता येत नाहीत. सध्या करोना मास्क बंधन काढले आहे.
खादाडी
संपूर्ण तिरुपती परिसर शाकाहारी आहे. इडली,वडे,डोसे आणि फक्त भात, सांबार, रसम,भाजी असलेली थाळी मिळते. एका ठिकाणी आंध्रच्या चटण्या, गुंगरा का खट्टा आचार आणि तेल मिळाले. इकडे सर्व पदार्थ केळीच्या पानावरच वाढले जातात. मेनू पाहून परोठा,नान, पंजाबी जेवण, महाराष्ट्रीय पिठलं भाकरी मिळण्याची रेस्टारोंही आहेत. आवडता चहा चांगल्या दुधाचा कुठेही/रेस्टारोंतही पंधरा रुपये फुल कप. मजा.
प्रसाद
फोटो ३
श्री वेंकटेशा बालाजी मंदिर बाहेरून
फोटो ४
श्री बालाजीचा रथ
हे महत्त्वाचे. आम्ही काहीही खटपट करून दर्शन करायचेच असे ठरवून गेलो नव्हतो. दहा मिनिटांत कुठे आत जाऊन येता येत असेल तिथे पर्यटन म्हणूनच जाणार होतो. नवरात्रानिमित्त ब्रह्मोत्सव सुरू होता. रात्री नऊला रांगेत राहिलेले भाविक सकाळी दहाला दहा सेकंदांचे दर्शन घेऊन बाहेर येत होते. देवाच्या दर्शनापेक्षा प्रसादाचे महत्त्व अधिक असते. ते मात्र मागच्या दाराने साध्य केले. चार लाडू मिळवले ( विकत घेतले.) नेहमिचेच बुंदीचे लाडू आहेत. आदि वराह स्वामी मंदिर आणि स्वामी पुष्करणी येथे गर्दी नव्हती ते पाहिले. इतके बारा तास रांगेत घालवलेले भाविक अन्नप्रसादमकडे जात होते. खूप गर्दी.
फोटो ५
तिरुमलै पर्वत, तिरुपती शहरातून
फोटो ६
तिरुमलै प्रवेश करताना एक कारंजा
चार तासांत तिरुमला आटपून खाली रूमवर विष्णू निवासमला आलो. तिथेही अन्नप्रसादमची सेवा आहे. दहीभात देतात हवा तेवढा. गर्दी नाहीच.( तिरुमलाच्या अन्नप्रसादम सेवेत संपूर्ण जेवण थाळी मिळते.)
इतर देवळे
तिरुपती रेल्वे स्टेशनला लागूनच श्री गोविंदराव स्वामी मंदिर आणि जत्रा बाजार आहे. ते शांतपणे पाहू शकतो. देऊळ हजार वर्षे जुने आहे, मोठे उंच (४०मिटरस)गोपूर आहे. तिरुमला पर्वतावर बघण्याची ठिकाणे आणि खाली तिरुपती मधील देवळे यांच्या देवस्थानच्या तसेच खासगी टुअरस आहेत. त्यांचे यूट्युबवरचे विडिओ पाहून आणि हाताशी असलेला वेळ याप्रमाणे अधिक पर्यटन शक्य आहे. वरच्या एका टुअरमध्ये मलबारी शेकरु पाहायला मिळते. वन्य प्राण्यांना खायला घालू नका अशा सूचना असतानाही त्या शेकरुंना भाविक लोक खायला देतानाचा विडिओ होता.तो आता Traveling Tadka channel ने काढून टाकला आहे.
फोटो ७
गोविंदराव स्वामी मंदिर, तिरुपती.
तिरुपती मध्येच तिरुमला वरून खाली येताना वाटेवरच पर्वताच्या पायथ्याशी (रेल्वे स्टेशनपासून तीन किमी) कपिलतीर्थ/कपिलेश्वराचे रम्य देऊळ आहे. छानसा धबधबा आणि पुष्करिणी आहे. ही फारच सुंदर जागा आहे. ही चुकवू नये.
फोटो ८
कपिलतीर्थ
पद्मावती मंदिरास गेलो नाही.
दुसऱ्या दिवशी तिरुपती पासून तीस किमी अंतरावर चे श्रीकालाहस्ती हे देऊळ पाहिले. इथे राहुकेतू दोष निवारण पूजा होतात त्यामुळे भाविकांची सतत येजा असते.
फोटो ९
श्री कालाहस्ती प्रवेश
विशेष - इथल्या ओटो रिक्षांना भाडेमिटर नाहीत. साठ रु/ किमी या भावानेच प्रवास करावा लागतो. बाकी धार्मिक ठिकाणी खर्च व्हायचाच. .
फोटो १०
पुष्करणी, तिरुपती. मागे रोषणाई केलेलं विष्णू निवासम.
(२,३,४,ऑक्टोबर २०२२.नवरात्र काळातले पर्यटन.)
या मागची कथा आहे की विष्णू ने राम अवतारात पद्मावतीला वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी विष्णू ने बालाजी हा अवतार घेतला
घाटात दोन्ही बाजूंनी जी झाडे आहेत ती बरीच परदेशी वाणाची आहेत. आतल्या भागात भारतीय वनातली आहेत. झाडी मात्र दाट आहे.
भाषा कोणती? तिथले लोक तेलुगूच बोलतात. पण आपल्याला विचारतात तेलुगू?/तमिळ?/इंदी?/इंग्लिश?
भाविकांच्या गटात पंधरा टक्के महाराष्ट्रातून,पंधरा हिंदी भाषिक,तीस तेलुगू,तीस तमिळ वाटले. मराठी लोक नांदेड,लातूर भागातले शेतकरी अधिक. पंधरा -वीस तीस लोकांचे गट आणि एक म्होरक्या. हॉटेल रूम घेत नाहीत, विष्णू निवासाच्या दोन मजल्यांवर फरशीवरच राहतात. ऐसपैस जागा, थंड पाणी, स्वच्छता गृहे आहेत सोयी. मोठा गट असल्याने लगेजची चिंता नसते, लॉकरस घेत नाहीत. इथेही अन्नप्रसादम ( म्हणजे फुकट अन्न) देतात. फक्त दहीभात असतो, कितीही मिळतो. चांगला असतो.
महाप्रसाद कांदा लसूण नसलेला म्हणजे पुरी - भूबनेसरचा (भूवनेश्वरचा). उत्तम आहार असतो.
बालाजीच्या गर्दीचा बाऊ करण्यात अर्थ नाही..
प्रत्येक ठिकाणी वेटींग साठी रूम्स असतात, तिथे बाथरूम , खाण्याची , मुलांना दूध वगैरे सोय असते . अशा हॉल मधून थांबत थांबत पुढे जायचे असते . शेवटी अर्धा तास उभे राहावे लागते.
काही हॉल मध्ये स्क्रीन असते .. तिथे पौराणिक चित्रपट असतात..
लहान मुले, वृद्ध असतील तर डायरेक्ट दर्शन मिळते .
आपल्या पुराणात जसे नाममहात्म्य तसेच स्थानमहात्म्य आहे.
त्यामुळे मी घरीच बरा, तिथे जाऊन काय वेगळे वगैरे पब्लिक असता त्यांना फाट्यावर मारून एकदा दर्शन घेण्यासाठी नक्की जावे
तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.
यामध्ये वेल्लोर, कांचिपूरम आणि महाबलीपूरम (मामल्लापूरम )या स्थळांना सप्टेंबरच्या (२०२२)शेवटच्या आठवड्यात भेट दिली होती. तिरुपतीची सहल याबरोबरच केली. तमिळनाडू भागात पावसाळा ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. तर तिरुपतीला मॉन्सूनसह या महिन्यांतही पाऊस पडतो. चार पाच ठिकाणं घेण्याचा उद्देश असा की एखादं ठिकाण पावसामुळे रद्द झालं तरी इतर पाहून ऐंशी टक्के पर्यटन व्हावं. सर्व ठिकाणी देवळंच आहेत आणि शिल्पांची गर्दी. वेल्लोरचा किल्ला हे एक धार्मिक नसलेलं ठिकाण, परंतू या किल्ल्यातही एक सुंदर देऊळ आहे. ही धार्मिक ठिकाणं ऐतिहासिक कशी हा प्रश्न पडतो पण तिथे असलेले शिलालेख आणि काही शिल्पं इतिहासाची नोंद करतात.
तमिळनाडू राज्यात पाच प्रकारची पर्यटन स्थळे आहेत.
१) धार्मिक - देवळे. भरपूर आहेत आणि सर्व देवळे पुजेत आहेत. काहींना वारसास्थळे म्हणता येईल.
२) हिल स्टेशन्स . उटकमंडलम, कोडाईकनाल, येराकूड, वेलापराई वगैरे.
३)वने आणि निसर्ग. - मुदुमलाई, वेदांतंगल वगैरे.
४)भौगोलिक - कन्याकुमारी दक्षिण टोक, रामेश्वरम् सेतू वगैरे.बंदरं
५) ऐतिहासिक - किल्ले,बंदरं वगैरे. वेल्लोर, चेन्नई,पुमपुहार बंदर.
जावे कसे / सहल आराखडा
चेन्नई ते महाबलीपूरम ६०किमी.
चेन्नई ते कांचिपूरम ७५किमी.
चेन्नई ते वेल्लोर १४०किमी.
कांचिपूरम ते महाबलीपूरम ७०किमी.
कांचिपूरम ते वेल्लोर ७०किमी.
कांचिपूरम ते तिरुपती (आंध्रप्रदेश ) १२० किमी
राहावे कुठे?
सर्व बजेटची हॉटेल्स आणि लॉजही आहेतच. कांचिमध्ये राहिल्याने देवळे बघणे आणि वेल्लोर,महाबलीपूरम पाहून येणे सोपे झाले. या भागांत रस्ते चांगले मोठे होते आणि ट्राफिक नव्हते.
ही अंतरे पाहिल्यावर असा विचार येईल की फ्लाइटने चेन्नई गाठावे, तिथे राहावे आणि रोज एका ठिकाणी जाऊन परत चेन्नई हॉटेलवर यावे. पण यात महाबलीपूरम ठीक आहे. कांचिपूरम शक्य नाही कारण तिथली देवळे अकरा ते साडेचार बंद ठेवतात. त्यामुळे कांचिपूरमला तीन दिवस राहाणे सोयीचे पडते. इथे जवळपास एक हजार देवळे आहेत. त्यातली पाच अगदी मुख्य. कांचि रेल्वे स्टेशन ते बस स्टेशन एवढ्या परिसरातच आहेत.
तमिळ भाषेत 'कोईल' म्हणजे राजवाडा. पण आता देऊळ या अर्थी रूढ झालेला शब्द.
पहिला दिवस -
१.कामाक्षी अम्मन कोईल. - भाविकांचे आवडते. कांचिचे मुख्य देऊळ.
२.एकांबरेश्वरार -अति भव्य गोपूर, ३५०० (?)वर्षे जुने आंब्याचे झाड आहे. मोठ्या खांबांचा प्रदक्षिणा मार्ग.
#.कांचीकामकोटी पीठम.- आद्य शंकराचार्यांनी स्थापलेला मठ. ही इमारत आताच बांधलेली वाटते. जुन्या मठाभोवती बाधकाम वाढवत नेले असावे.
३. उलगराज पेरूमल कोईल ( वामनावताराचे देऊळ) .
ही चारही कोईल जवळ जवळ आहेत.
दुसरा दिवस
कांचिपूरम ते चेंगलपट (चेंगलपट्टू), चेंगलपट ते महाबलीपूरम. सत्तर किमी.या प्रवासात वाटेत तिरुक्कुळकुंद्रन'ची टेकडी आणि गाव येते. (इथेच प्रसिद्ध पक्षीतीर्थ आहे. तिथे थांबलो नाही.)
सकाळी महाबलीपूरम जाऊन पाहून चार वाजता परत येताना कांचिपूरममध्ये असलेले
Mahabalipuram
((मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Mahabalipuram
https://youtu.be/9CsZkXgcPZE ))
४) 'वरदराज पेरूमल कोईल' चार ते सहा पाहाणे. - पुजेत असलेले महा विष्णू मंदिर. इथे पुष्करणीत असलेल्या सभामंडपात शिल्पे आहेत. अखंड कोरीव चार दगडी साखळ्या आहेत. मंदिराच्या आत फोटोग्राफी करता येत नाही. मार्गात अंधार आणि गिचमिड आहे परंतू खूप भित्तीचित्रे आहेत. तसेच एक सोन्याचे पाणी दिलेली दीड फुटी पाल आहे त्याचे दोन रुपये तिकिट घेतात. विष्णू आणि पाल यांचा पौराणिक संबंध काय हे माहीत नाही. परंतू बऱ्याच विष्णू देवळांच्या भिंतींवर पाली कोरलेल्या सापडतात. हंपीतल्या उत्कीर्ण विष्णू मंदिरावरही पाल आहे. भाषेच्या अडचणीमुळे पुजाऱ्यांना विचारता आले नाही.
कांचितील देवळे.
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Temples
https://youtu.be/q0EzIZr-nY4 ))
तिसरा दिवस
सकाळी वेल्लोर आणि परत चारला आल्यावर कैलासनाथार कोईल. हे आणि वैकुंठ पेरूमल कोईल ही सर्वात जुनी देवळे आहेत.
कैलासनाथार कोईल. - आठव्या शतकातील द्रविड शैलीतील छोटेसे मंदिर. जे भव्यतेत नाही ते इथे शिल्पकलेत साधले आहे. वालुकाश्म दगडातली शिल्पे झिजू लागली आहेत. ठसठशीत मोठी ५८ शिल्पे. मूर्तींवर भाव आहेत. एकूण तीन भाषांत शिलालेख आहेत.जुनी तमिळ,जुनी उडिया आणि संस्कृत. ऐतिहासिक वारसाच.
दिवसभर पाहता येते. वेल्लोर रस्त्यावर 'काशिभिष्वर कोईल' (काशी विश्वेश्वर कोईल) आहे तिथून दोन किमी आत कैलासनाथार कोईल आहे.
वेल्लोर आणि जलकंठेश्वर
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Vellore fort and Jalkantheshwar koil.
https://youtu.be/HcvFglGMlHY ))
Photo slideshow, Kailasnathar koil.
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Kailasnathar koil.
https://youtu.be/8aAFUti_eco ))
वैकुंठ पेरूमल कोईल - हेसुद्धा आठव्या शतकातील आहे पण वेळेअभावी पाहायचे राहिले.
चौथ्या दिवशी
कांचिपूरम ते तिरुपती. तिथे दोन दिवस राहून घरी परत.याचा दुसरा वेगळा लेख लिहिला आहे.
सप्तपुरींतील एक कांचिपूरम म्हणजे खूप जुने शहर. धार्मिक आहेच पण रेशमी वस्त्रे उद्योगही जुनाच आहे. तो पाहिला नाही परंतू कांचिपूरम पद्धतीच्या(कृत्रिम रेशमाच्या) साड्या हजार - दोन हजारांत मिळतात त्या सहा घेतल्या. खऱ्या रेशमाची साडी पंचवीस हजारांपुढे सुरू होते. कांचिमध्ये भाषेची अडचण येते.तमिळच बोलतात. साडी दुकानदार मात्र हिंदीत बोलतात. थोडी तात्पुरती तमिळ शिकलो ती बोललो.
(Learn Tamil through English, by Agurchand Babu channel.)
खादाडी -
एका ओळीत सांगायचं तर रसम, सांबारम, भातम. इटली, वडै, डोसै.
इतर टिप्पणी -
तमिळनाडूत गेलो नव्हतो. (म्हणजे तसं उटी आणि कन्याकुमारी झालं होतं) पण ,मदुरै,रामेश्वरम् करण्याचा विचार होता. ते खूप दूर आहे. अगोदर जवळचे पाहू आणि ठरवू म्हणून ही सहल काढली. त्यावरून देवळांची कल्पना आली. मदुरै,रामेश्वरम् जाण्याची गरज नाही हे ठरले. चेन्नई तर शहरच आहे ते बादच केले. देवळे आणि शिल्पे आवडत नसतील त्यांनी ही सहल करू नये.
फोटो - लेखामध्ये अडिचशे फोटो देणे शक्य नाही म्हणून फोटो स्लाईड शो करून यूट्यूबवर देण्याचा नवीन प्रयत्न केला आहे. शिल्पांची थोडी कल्पना येईल हा हेतू. शिल्पांचे फोटो असल्याने पोर्ट्रेट आस्पेक्ट ३:४ मध्ये काढले आहेत. मोबाईलवर बरे दिसतात. प्रयोग आहेत. सुधारणा करू. सवडीने पाहा आणि अभिप्राय द्या. फोटोंना क्रमांक दिले आहेत त्या संदर्भाने विचारणे सोपे जाईल. जीमेल स्टोरेज १५जीबी फ्री असले तरी अडिचशे फोटोंनी बाराशे एमबी अडवले असते आणि लेखात दहा पंधरा फोटो देऊन चालणार नाही म्हणून स्लाईडशो. विडिओ काढले आहेत पण ते जोडण्याचे सॉफ्टवेअर मोबाईलला नसते. असो.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.