कोकणातील ५१ शिवमंदिरे
सर्वसाधारणपणे असा समज आहे की कोकणात प्राचीन मंदिरे नाहीत. याला अपवाद आहे फक्त कर्णेश्वर मंदिराचा. परंतु गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांत कोकणात अनेक सुंदर सुबक मंदिरांची निर्मिती झाली. त्यांची स्वतःची एक वेगळी शैलीची आहे जिचा अभ्यास होणे आवश्यक आहे. विविध ग्रामदेवता, कुलदेवता यांची मंदिरे जवळजवळ प्रत्येक गावात आहेत. या परशुराम भूमीतील लोकांची शिवशंकरावर विशेष श्रद्धा. साहजिकच शंकराची अनेक मंदिरे कोकणात पाहता येतात. प्रत्येक मंदिराचा आसमंत वेगळा, दिमाख वेगळा. दर्या फिरस्ती ब्लॉगवर आपण प्रत्येक मंदिराबद्दल सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत पण कोकणातील काही खास शिवमंदिराची झलक या ब्लॉगमध्ये पाहूया.

घारापुरी लेण्यातील ही सदाशिवमूर्ती. या ठिकाणी भगवान शंकराच्या चरित्रातील अनेक प्रसंग दगडात कोरून घडवले गेले आहेत. अंधकासूरवध, गंगाधर शिव, शिव-पार्वती विवाह, रावणाने कैलास पर्वत हलवणं असे अनेक प्रसंग इथं पाहता येतात.

Kartikeya & Ganesh 


Andhakasura Vadha 


मुंबईत मंडपेश्वर लेण्यातही शिवाची पूजा केली जात असे तिथं नटराजाची अतिशय सुंदर मूर्ती पाहता येते.

मुंबईजवळ अंबरनाथला असलेल्या प्राचीन शिवालयात शंकराची अनेक रूपे आणि प्रतिमा पाहता येतात.
अलिबागजवळ उंच डोंगरावर असलेला कनकेश्वर आणि जवळच असलेला पालेश्वर महादेव यांचे दर्शन घेता येते. पालेश्वर महादेवाची विशेष गोष्ट म्हणजे इथं देवाला फुलांऐवजी फक्त पानेच अर्पण केली जातात.
मुंबईतील जोगेश्वरी लेणी ही शिवाला समर्पित लेणी असून तिथं दगडात कोरलेली शिवरूपे पाहता येतात.

मुंबईतील परळ येथे पाचव्या शतकात सापडलेली शिवमूर्ती फार अद्भुत आहे. रस्त्याचे काम सुरु असताना ती सापडली आणि मग पुरातत्व विभागाने संवर्धन करून तिथेच जतन केली आहे. या मूर्तीची प्रतिकृती आणि घारापुरी येथे सापडलेली शिवमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पाहता येते.
मुंबईजवळ लोनाड येथे एक भग्न तरीही भव्य असे प्राचीन शिवमंदिर आहे. तिथली शिवशिल्पे आणि मंदिराची रचना आवर्जून पाहण्यासारखी आहे.
भगवान श्री शंकराचे कोकणातील एक मोठे स्थान म्हणजे हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी कालभैरवाचे मंदिरही आहे.
कोकणात अनेक ठिकाणी छोट्या गावांमध्येही अतिशय सुंदर पेशवेकालीन शिव मंदिरे आहेत. सप्तेश्वर देवस्थान पंचनदी येथे आहे आणि रत्नागिरीजवळ भावे अडोम या ठिकाणीही आहे.



DCIM\101MEDIA\DJI_0074.JPG 
दिवेआगर आणि श्रीवर्धन परिसरात काही सुंदर शिवमंदिरे आहेत. दिवेआगर जरी सुवर्णगणेश, सुंदर नारायण, रुपनारायण अशा मंदिरांसाठी प्रसिद्ध असले तरीही तिथं उत्तरेश्वर नावाचे जांभा दगडात बांधलेले सुबक मंदिर आहे. श्रीवर्धनच्या तलावाजवळ जीवनेश्वर शिवमंदिर आहे. अलिबागच्या छत्री बाग परिसरात आंगरे घराण्यातील समाधी आहेत. तिथंच एक अतिशय सुंदर शिवलिंग पाहता येते.
रत्नागिरीजवळ काळबादेवीला खाडीच्या किनाऱ्यापाशी असलेलं रामेश्वर शिवालय म्हणजे आवर्जून भेट द्यावी असं एक अतिशय सुंदर ठिकाण.
मुंबईजवळच घोडबंदर किल्ल्याकडे जाताना एक छोटेसेच पण सुरेख शिवमंदिर पाहता येते. हे आहे अमृतेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जगन्नाथ शंकरशेट यांच्या स्मरणार्थ बांधले गेले.
दापोलीजवळ आसूद येथे शिवाचे अतिशय सुंदर व्याघ्रेश्वर मंदिर आहे. लाकडी बांधकाम, प्राचीन शिल्पं आणि वीरगळ हे या मंदिराचे वैशिष्ट्य. काळभैरव-योगेश्वरीची अश्वारूढ मूर्ती तशी दुर्मिळच. इथं ही मूर्तीही नक्की पहा.
रत्नागिरीजवळच काजळी नदीच्या काठी सोमेश्वर शिवालय आहे. शहरापासून खूप दूर जरी नसलं तरीही अनुभव अगदी शांत, निवांत.
हेदवीचा दशभुज गणेश आणि जवळ समुद्रकिनाऱ्यावर असलेली बामणघळ प्रसिद्ध आहे. तिथेच समुद्रकिनाऱ्यावर असलेलं उमा-महेश्वराचं मंदिरही खूप सुंदर आहे.
कोकणातील महत्वाच्या प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे कर्णेश्वर मंदिर. कसबा संगमेश्वर येथील हे मंदिर चालुक्यवंशीय कर्णराजाने बांधलेले आहे. उत्कृष्ट कोरीवकामाने सजलेलं हे मंदिर जरूर पाहायला हवं.
दापोलीजवळचा कर्दे समुद्रकिनारा अतिशय रम्य ठिकाण. तिथून काही अंतर दक्षिणेला करंजगाव येथे वेळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दाबके कुटुंबियांचे हे कुलदैवत.
पूर्णगड किल्ल्याच्या पायथ्याशी भगवान शंकराचे एक रेखीव देवालय आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान. पेशवेकालीन मराठा स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर गडफेरी करताना क्षणभर विश्रांती घ्यायलाही उपयुक्त आहे.
वालुकेश्वर म्हंटलं की मुंबईचे देऊळ आठवते ना? परंतु याच नावाचे अतिशय एक शिवालय गुहागरजवळ असगोळी गावात आहे.

वेळास गावातील रामेश्वर शिवालय नक्की पहा. नाना फडवणीसाचे हे गाव ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

अंजनवेल किंवा गोपाळगड किल्ल्याजवळच आहे टाळकेश्वर देवालय. उंच कड्यावरील या ठिकाणाहून अथांग सागराचे दर्शन घेणे ही एक पर्वणीच असते.
आमच्या कोळथरे गावातील कोळेश्वराचे मंदिर हे इसवीसन १८६० साली बांधलेले मंदिर आहे. यावरील घुमट पाहिले असता इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो.
नागाव येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतलेले श्री वंखनाथ देवस्थान अठराव्या शतकातील एक अनोखे मंदिर आहे. दगडात कोरलेली शिल्पे आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंग हे या स्थानाचे वैशिष्ट्य.
नागाव येथे तलावाकाठी बांधले गेलेले एक सुंदर पेशवेकालीन शिवालय म्हणजे श्री नागेश्वर देवस्थान
हंबीररावाचा प्राचीन मराठी शिलालेख असलेले नागाव परिसरातीलच एक शिवालय म्हणजे श्री भीमेश्वर देवस्थान. याचे बांधकाम पार्वतीबाई पेशवेंनी करून घेतले होते.
अलिबागच्या दक्षिणेला असलेल्या अक्षी गावामध्ये सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात सुंदर कोरीवकाम असलेले लाकडी खांब असून, अक्षी गावचे दोन गद्धेगाळ इथं जवळच आहेत.
केळशीजवळ उटंबर येथे बेलेश्वर नावाचे शिवालय आहे.
पालीजवळ आसरे येथे विरेश्वर महादेव मंदिर आहे. तिथं वीरगळ पाहता येतात.
गुहागर येथील प्राचीन शिवमंदिर व्याडेश्वर हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. पंचायतन असलेले हे मंदिर गुहागरची ओळख आहे असं म्हणता येईल.
वेळणेश्वरच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावरच आहे एक भव्य शिवालय. श्री वेळणेश्वर देवस्थान
विजयदुर्ग आणि देवगडजवळ वाडा नावाचे ठिकाण आहे तिथं एक अनोखं शिवमंदिर आहे. श्री विमलेश्वर शिवालय. गुहेत बांधलेल्या या मंदिरात वीरगळ आहेत आणि प्रचंड हत्तीची शिल्पं आहेत.
आंबोळगडजवळच नाटे नावाचे गाव आहे. त्या गावचे शिव मंदिर आहे श्री नाटेश्वराचे.
विजयदुर्ग किल्ल्याजवळच गिर्ये गावात श्री रामेश्वराचे देऊळ आहे. कातळात खोदून काढलेली उताराची वाट आणि भिंतींवर रंगवलेली सुंदर चित्रे ही या मंदिराची खासियत म्हणता येईल.
रामेश्वर नावाचे देवस्थान आचरा येथेही आहे.
चौलचे श्री रामेश्वर देवस्थान तर प्रसिद्धच आहे.
फार दूर कशाला जा अगदी मुंबईतही रामेश्वर नावाचे शिवालय आहे. बाणगंगा तलावाजवळच…

माडबन शुभ्र वाळू असलेल्या रम्य सागरतीरासाठी प्रसिद्ध आहे.. तिथं जवळच अंजनेश्वर देवस्थान आहे.
वेंगुर्ल्यालाही श्री रामेश्वर देवस्थान आहे बरं का! काय कहाणी असेल बरं या नावामागे? आणि कोकणात हे इतकं प्रचलित का असेल?
वेंगुर्ल्याजवळच माठ नावाच्या गावात श्री मांगल्येश्वराचे स्वयंभू देवस्थान आहे. इथंही वीरगळ आहेत.
रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यच. हिरोजी इंदुलकराचा आणि रायगड निर्मितीचा शिलालेख इथं पाहता येतो.
रायगडावरील जगदीश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे. तिथं अजून एक छोटे शिवालय आहे ते म्हणजे श्री वाडेश्वर महादेवाचे

आमच्या कोळथरेला एक छोटेसे शिवमंदिर आहे ते म्हणजे श्री बापेश्वर देवालय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक खूप महत्त्वाचे शिवमंदिर म्हणजे श्री कुणकेश्वर. अत्यंत रम्य अशा समुद्रकिनारी हे उत्तुंग शिखर दुरूनच खुणावत असते.

जयगड किल्ल्याजवळ शास्त्री नदीच्या मुखाशी श्री कऱ्हाटेश्वराचे देवस्थान आहे. जोग मंडळींचे हे कुलदैवत. काही पायऱ्या उतरून नदीच्या किनारी गेलं की एक गोमुख झरा तिथं दिसतो. अतिशय निर्मळ आणि शीतल पाणी देणारा.. हे तीर्थप्राशन नक्की केलं पाहिजे.
दाभोळ गावाजवळच असलेले अतिशय महत्वाचे शिवालय म्हणजे श्री दाल्भेश्वराचे. इसवीसन १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं येऊन दर्शन घेतले असे मानले जाते.

तर कोकणातील अनेक शिवमंदिराचे दर्शन या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला घडवले. दर्या फिरस्ती ब्लॉगद्वारे आम्ही कोकणातील अशाच अनोख्या ठिकाणांची चित्रभ्रमंती करत आहोत. कोकणातील दृश्य संस्कृतीचे संवर्धन करत आहोत. आमच्या या ब्लॉगला नेहमी भेट द्या हे अगत्याचे आमंत्रण. संकल्पना आवडली असेल तर लाईक करा.. शेयर करा. मित्रांना, स्नेह्यांना, कोकणवेड्या भटक्यांना आमच्या ब्लॉगबद्दल नक्की सांगा.
मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
काही वर्षांपूर्वी मिठबाव-तांबळडेग परिसरात मुक्काम केला होता तेव्हा उत्तर टोकाला असलेल्या गजबादेवीच्या मंदिरापासून दक्षिणेला असलेल्या नारिंग्रे नदीच्या मुखापर्यंत सकाळी लवकर उठून आणि मावळतीच्या आधी मनसोक्त पायपीट केली होती. नारिंग्रे नदी जिथं समुद्राला मिळते तिथून पलीकडे एक वाळूची लांबलचक पुळण दिसते. तो आहे मोर्वेचा किनारा. पुन्हा देवगड तालुक्यात येऊ तेव्हा या किनाऱ्यावर नक्की जायचं असे ठरवले होते. २०२४ च्या पावसाळ्यात मी थोडं पुढे म्हणजे तोंडवळीला राहिलो होतो तेव्हा इथं धावती भेट झाली होती. पण मी किनाऱ्यावर पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. वेळ भरतीची असल्याने लाटांचे तांडव सुरूच होते. मी एकटाच होतो त्यामुळे पुढं अधिक न जाता ‘मी पुन्हा येईन’ असा निश्चय करून मी आचऱ्याला गेलो होतो. पण जानेवारी २०२५ च्या कोकण भ्रमंतीत इथं ओहोटीची निवांत वेळ पाहून यायचे असे ठरवले होतेच. तांबळडेगहून मी मोर्वे किनाऱ्याचा फोटो ड्रोनने घेतला होता त्यात किनाऱ्याच्या उत्तर टोकापर्यंत गेलेली कच्ची गाडीवाट आणि अरुंद पण लांबलचक शुभ्र वाळूची पुळण दिसली होती. देवगडचे डॉक्टर मित्र मनोज होगळे यांनीही इथं जरूर जायला हवं अशी शिफारस केली होतीच.

सागरी महामार्गावर असलेल्या हिंदळे गावातून मोर्वेकडे जायला सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे. गावात एक सुंदर सरस्वती मंदिराची घर-सदृश इमारत दिसली.. पण मागल्या खेपेला चौकशी केली होती तेव्हा काही विशेष माहिती मिळाली नव्हती. आज मुद्दाम थांबून आत डोकावले तर मूर्ती दिसली नाही. जेट्टीपर्यंत चारचाकी जाते खरी पण शेवटचा एक किलोमीटर रस्ता इतका वाईट आहे की मी गाडी छोट्या पुलाच्या अलीकडे लावून चालत जायचे ठरवले होते.

डांबरी रस्ता काळभैरव मंदिराला वळसा घालून गाव पार करून खाडीच्या दिशेने जातो आणि मग पश्चिमेकडे वळतो. या भागात तो खाडीला समांतर परंतु सुमारे शंभर दीडशे फूट उंचावरून जेट्टीकडे जातो. डाव्या बाजूला आंब्याच्या बागा आहेत आणि उजवीकडे पाणी. यावेळी मला इथं नेपाळ आणि झारखंड हून आलेली अनेक मजूर मंडळी रस्त्यालगत माजलेले तण छाटताना आणि माकडे हाकलताना दिसली. स्त्री-पुरुष दोघेही होते.. बहुतेक आंब्याच्या मोसमाआधी इथं मजुरीसाठी अनेक कुटुंबे येतात. कोकणाची घटती लोकसंख्या आणि स्थानिक शेती-बागायती मजुरांचा अभाव ही सर्वत्र भेडसावणारी समस्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे सारख्या छोट्या गावातील आमरायांमध्येही सुमारे साडेतीन हजार नेपाळी मजूर आहेत असे मी एका स्थानिक बागायतदाराकडून ऐकले होते. ही फार गुंतागुंतीची समस्या आहे.. स्थानिकांना हा सांस्कृतिक हल्ला वाटतो आणि रोजगारावर डल्ला वाटतो तर स्थानिक उद्योजक आम्हाला कामासाठी लोक मिळत नाहीत.. मिळाले तर वर्षभर कामाला सतत उपलब्ध नसतात अशी तक्रार करतात. मानवी स्थलांतर ही एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि त्याबाबतीत संघर्षापेक्षा समन्वयाची भूमिका जास्त उपयोगाची आहे हे जरी खरे असले तरीही एखाद्या छोट्याशा गावात इतक्या मोठ्या संख्येत जर स्थलांतरित मंडळी अचानक दिसली तर लोकांना वाटणारी चिंताही साहजिक आहे ज्याचे निराकरणही करायला हवे. असा विचार करत करत मी जवळजवळ एक किलोमीटर चाललो असेन आणि जेटी ओलांडून पलीकडे नारिंग्रे नदीच्या टोकाला जाऊन पोहोचलो.


तांबळडेग किनाऱ्यावर जिथे उभा राहून मी मोर्वे किनारा पाहिला होता, ती जागा समोरच दिसत होती. नदीचे पात्र अगदी उथळ आणि शांत भासत होते. कोकणातील नद्या सह्याद्रीतून उगम पावतात आणि शंभर किलोमीटरच्या आतच सागरात विलीन होतात. वर्षभर अशा अगदी सौम्य वाटणाऱ्या नद्या पावसाळ्यात मात्र प्रचंड रौद्र रूप धारण करतात.

जेटी ओलांडून किनाऱ्यावर उतरलो तेव्हा ओहोटी असल्याने लाटा अगदी सौम्य होत्या, पाणी जवळजवळ स्थिर होते असेही म्हणता येईल. त्या स्वच्छ पात्रात खडकाळ तळ अगदी स्पष्ट दिसत होता. तांबळडेग किनाऱ्यावर असलेली वृक्षराजी आणि वाळूच्या दांड्याची शुभ्र रेषा क्षितिज रेषेला टेकलेली होती. आकाश अगदी स्पष्ट दिसत होते खरे पण इथं एखादा अवखळ ढग रेंगाळत बसला असता तर चित्र पूर्णत्वाला गेले असते. तांबळडेग हा वाळूच्या टेकड्यांच्या संचयाने बनलेला किनारा आहे असे प्राध्यापक श्रीकांत कार्लेकरांच्या पुस्तकात वाचल्याचे मला आठवते.

चंद्रकोरीसारखा भासणारा मोर्वे किनाऱ्याचा
उत्तर भाग ओलांडून मी काहीसा पुढं आलो आणि आता तांबळडेगचा दांडा अगदी समोर
दिसू लागला होता. एखाद्या निष्णात चित्रकाराने चितारावा तसा बहुरंगी आणि
आठवणींच्या पटलावर कायमचा कोरला जाईल असा देखावा समोर दिसत होता.
सोसाट्याचा वारा वाहायला लागला होता आणि मला कुसुमाग्रजांची कविता आठवली …
कुठल्या मुलखामधून येसी, कुठल्या मुलुखा जासी
गगनपथाचा स्वैर मुशाफिर वसुधेचा रहिवासी

किनारा बराच रुंद आहे आणि जेटीजवळ उंच असलेले टेकाड दक्षिणेकडे बुटके होत जाते. तरीही गाव आणि किनाऱ्याच्या मधोमध ही टेकडी किनाऱ्याला अगदी समांतर पसरलेली आहे. समुद्र आणि आकाश दोहोंची अथांग निळाई पाहता पाहता किनाऱ्याचा मधला टप्पा पार करून आपण दीड किलोमीटर तरी पुढं आलेले असतो. इथं पुन्हा एकदा किनारा थोडासा अरुंद होतो आणि एकीकडं समुद्र तर दुसरीकडं छोटासा ओढा या जागेत किनारा आणि खडकांची आरास दिसते.


कोकण किनारपट्टीवर मुख्यतः बॅसाल्ट खडक आढळतात, जे डेक्कन ट्रॅपच्या ज्वालामुखी उद्रेकांमुळे तयार झाले आहेत. याशिवाय, काही ठिकाणी खालील प्रकारचे खडकही आढळतात:
- बॅसाल्ट (Basalt) – कोकणातील बहुतांश भागात आढळणारा गडद, कठीण ज्वालामुखी खडक.
- लेटेराइट (Laterite) – कोकणातील लालसर मृदा आणि खडक, मुख्यतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात आढळतात. हे मृदू असून पावसामुळे झिजतात.
- सेंद्रिय खडक (Sedimentary Rocks) – काही भागांत वाळूचा थर आणि चुनखडी (Limestone) आढळते, विशेषतः किनारपट्टी भागात.
- ग्रॅनाइट आणि न्याइस (Granite & Gneiss) – कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये आढळणारे कठीण खडक.
- कांकर आणि शेल (Conglomerate & Shale) – काही भागात गाळातून तयार झालेल्या या प्रकारच्या खडकांचे थर आढळतात.

किनारा अर्धा चालून पार केल्यानंतर मला हा अतिशय देखणा आणि प्रचंड मोठा खडक दिसला. इथला हा खडक हे ग्नाइसचे रूप आहे असे मला प्राध्यापक सुरेंद्र ठाकूरदेसाईंकडून समजले. ग्नाइस हा एक रूपांतरित (Metamorphic) खडक असून, तो प्रामुख्याने ग्रॅनाइटसारख्या आग्नेय खडकांपासून किंवा काही तलछटी खडकांपासून (Sedimentary Rocks) तयार होतो. हा खडक प्रचंड उष्णता आणि दाबाच्या प्रभावाखाली रूपांतर प्रक्रिया (Metamorphism) होऊन तयार होतो. जर उष्णता आणि दाब आणखी वाढले, तर खनिज रचना अधिक पुन्हा मांडली जाते आणि शिस्ट तयार होतो. सूर्य आता हातभर वर आलेला असल्याने त्याच्या किरणांनी खडकाचा वरचा भाग उजळून निघाला होता. नेहमी दिसणाऱ्या लालसर जांभा दगडापेक्षा याचा रुबाब काहीसा वेगळा होता.

जिथं गाडी लावली होती ते ठिकाण आता जवळजवळ पावणेदोन किलोमीटर दूर होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले होतेच. पुन्हा जेट्टीजवळ आलो तेव्हा दमलो होतो आणि घामाघूमही झालो होतो.. तिथल्याच एका उंचवट्यावर थोडा वारा खात आराम करायला बसलो. मासेमारी करून परतलेली एक यांत्रिक नौका खाडीतून मिठबावच्या बंदरात जात होती. तिच्या इंजिनाची घरघर सोडली तर सर्वकाही स्तब्ध आणि शांत होते. दुपार होत आलेली असल्यानं मला हिंदळे गावातील कार्तिक स्वामींचे मंदिर गाठायची घाई होती. याआधी मी किमान तीनचार वेळेला तिथून गेलो होतो पण मंदिर आणि मूर्ती आतून पाहता आले नव्हते. आज जर सुदैवाने मंदिर उघडे मिळाले तर ती संधी सोडायची नव्हती.. त्यामुळे पटकन उरलेला रस्ता चालत गेलो आणि हमरस्त्याच्या दिशेने गाडी पळवायला लागलो.
भ्रमंती तोंडवळी-तळाशीलची
पावसाळ्याच्या दिवसातील कोकणातील एक संध्याकाळ.. आकाश भरून आलं होतं खरं पण सरी कोसळत नव्हत्या. आकाशात काळे ढग तर दिसत नव्हते पण एक उदास राखाडी रंगाची गोधडीच जणू संपूर्ण आकाशाने पांघरली होती. मी आचरा देवगड रस्त्यावरन तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो.

मी आचरा देवगड रस्त्यावरून तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. तोंडवळी आणि तळाशील ही दोन जोड गावे कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सूर्यास्ताला तासभर उरला असेल.. सूर्यनारायण ढगांच्या मागे क्षितिजापासून हातभर वर दिसत होता. तिथं जवळच एका डबक्यात डुंबणाऱ्या म्हशींचे गमतीशीर दृश्य मला पाहायला मिळालं.

पावसाळा असल्याने नेहमी रखरखीत असलेल्या कातळ सड्यावर हिरवळ पसरली होती. अनेक ठिकाणी खोलगट जागांमध्ये छोटीशी तळी तयार झाली होती. पाणी साठवण्यासाठी अशी छोटीशी तळी खोदण्याची पद्धत होती असे मला कांदळवन सफारी करणाऱ्या वाडेकर काकांनी सांगितले होते.

सड्यावरून उतारावरून मी समुद्राच्या जवळ जाणाऱ्या रस्त्याने तोंडवळीच्या दिशेने पुढे निघालो. हा रस्ता सुरूच्या बनातून गड नदीची खाडी आणि समुद्र यांच्या मधल्या जागेतून पुढे जातो. ही जागा वन विभागाच्या अखत्यारित येते. गड नदीच्या मधोमध इथं पाणखोल आणि खोत जुवा नावाची बेटे आहेत ज्यांच्यावर लोकवस्ती आहे आणि इथे बरेच होमस्टे सुद्धा आहेत अजून तरी मला तिथे जाण्याची संधी मिळालेली नाही. पण पावसाळ्यात इथले पर्यटन बंद असल्याने मी जास्तीत जास्त वेळ तोंडवली आणि तळाशील मध्येच व्यतीत करायचा असं नक्की ठरवून आलो होतो फार तर आजूबाजूच्या वायंगणी आचरा या गावांमध्ये हिंडायचे असे ठरवले होते.

तोंडवळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले सुरूचे घनदाट वृक्षवन. प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या मते ३० हेक्टर क्षेत्रात हे वन पसरले आहे. किनाऱ्यालगत असलेल्या गावांचे वाळूपासून संरक्षण करणे आणि किनाऱ्याची धूप थांबवणे हे या वनांचे दुहेरी काम. डॉ कार्लेकर सांगतात त्याप्रमाणे या वनराईने किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनाही आश्रय मिळतो, सावली मिळते. असे वनीकरण मी मिठमुंबरी आणि गावखडीला पाहिले आहे. आचरा खाडीच्या मुखापासून जर तोंडवळी तळाशील च्या टोकापर्यंत चालत गेलं तर जवळजवळ १२ किलोमीटरची भ्रमंती होते.

तळाशीलच्या वाळूच्या दांड्याचे टोक पाहण्याची सगळ्यात छान जागा म्हणजे सर्जेकोट बंदर. इथून आपल्याला गड नदीचा सिंधुसागराशी संगम आणि तळाशीलची शुभ्र पुळण पाहता येते.

मी गेलो होतो तेव्हा पावसाळा संपला नव्हता, गणपतीचे दिवस नुकतेच झाले होते त्यामुळे परिसरातील सगळी हॉटेल्स सुरु झाली नव्हती. आणि नित्यानंद प्राईडला राहण्याचा विचार होता पण त्यांच्या रिसॉर्टमध्ये मेंटेनन्स सुरु असल्याने त्यांनी मला नाना पाटील यांच्या क्षणभर विश्रांतीत राहायला सुचवले. समुद्राला लागून वाडीत असलेलं घर, स्वच्छ आणि प्रशस्त खोली आणि उत्तम चविष्ट घरगुती स्वयंपाक यांची सोय असल्याने मला काहीच अडचण आली नाही. माझी वीजेवर चालणारी गाडीही तिथे अगदी व्यवस्थित चार्ज झाली. मला सुट्टी मिळालेली नसल्याने वर्क फ्रॉम तोंडवळी-तळाशील-आचरा असा माझा प्लॅन होता. पण सकाळी लवकर आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर चालत जाण्याचा आनंद मी रोज घेतला असेल. मासेमारीसाठी आपली बोट तयार करणारी मंडळी मला इथं किनाऱ्यावर भेटली.. त्यांच्याशीही गप्पा झाल्या.

तोंडवली गावामध्ये एक विलक्षण वेगळे मंदिर आहे त्याचं नाव आहे वाघेश्वर देवस्थान इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की बिबट्या वाघ इथं या देवळात येतो किंवा इथं जवळच असलेल्या एका गुहेत येऊन बसतो. या मंदिराबद्दल एक स्वतंत्र ब्लॉग आहे जो तुम्हाला इथं वाचता येईल. भगवान शंकराच्या या देवळात वाघोबाला सुद्धा देवतेचा मान आहे.

नकाशात बघून असं वाटतं खरं की तळाशील संगम अगदी जवळच आहे परंतु प्रत्यक्ष तिथे पोहोचायला, जिथे गाडी रस्ता संपतो तिथून जवळजवळ दीड किलोमीटर चालत जावं लागतं अर्थात उजवीकडे लाटांची आवर्तने पाहत चालत असताना आणि समुद्राची गाज ऐकताना हा वेळ अगदी मजेत जातो. ावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी अगदी निखळ स्वच्छ सूर्यास्त पाहता येत नाही क्षितिजावर ढगांची दाटी असते त्याच्यामुळे त्या ढगांच्या पलीकडे लपलेल्या लाल नारंगी रंगांची उधळण हाच काय तो सूर्यास्ताचा आभास आपण त्या क्षणी पाहू शकतो.

मला नकाशात दिसलेल्या सॅटेलाईट चित्रावरून असं वाटलं होतं की इथं वाळूच्या दांड्यावर फारशी वृक्षराजी नाही परंतु प्रत्यक्षात इथं अगदी शेवटपर्यंत हिरवळ असल्याचे पाहून सुखद आश्चर्य वाटले. जाऊन येऊन अर्ध्या तासाची छान अडीच किलोमीटर लांबीची भ्रमंती झाली. गड नदीच्या संगमाच्या मुखाच्या थोड्याशा उत्तरेला एक खडकाळ भाग आहे त्याला कवडा रॉक्स असे नाव स्थानिकांनी दिले आहे. काहीजण या जागेला शिंपला पॉईंट असेही म्हणतात.


सूर्यास्त होता होता का होईना पण त्या ढगांच्या मागे लपंडाव खेळणाऱ्या सूर्यनारायणाने काही क्षण का होईना निरोपाचे दर्शन दिले खरे. आकाशात संध्यारंग पसरू लागले होते तीच रंगसंगती समोर ओहोटीच्या लाटांवरही उमटत होती. विस्तीर्ण आकाश आणि प्रचंड मोठा समुद्रकिनारा यांच्यासमोर तिथं वावरणारी माणसं शुल्क ठिपक्यासारखी वाटत होती


अशा ठिकाणी एकटं चालत असताना मनात कुठली ना कुठली कविता डोकावते त्या दिवशी मला बा भ बोरकरांची जलद भरूनि आले ही कविता आठवली…
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले
दिन लंघुनि जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरि
पद्मरागवृष्टी होय माड भव्य न्हाले.. अशी कवितेची सुरुवात आहे..
आणि शेवटचे कडवे तर त्या क्षणाला अगदी समर्पक म्हणता येईल असे होते..
धूसर हो क्षितिज त्वरित
ढोर पथीं अचलचकित
तृण विसरूनी जवळिल ते
खिळवी गगनिं डोळे
टप टप टप पडती थेंब मनिवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास भूमि आशीर्वच बोले
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
तोंडवळी चा वाघेश्वर
मालवण पासून फार दूर नाही तरीही खूप शांत, निवांत, निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं एक ठिकाण म्हणजे तोंडवळी. या जागेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं असलेली वनराई. सहसा समुद्रकिनाऱ्याच्या इतक्याजवळ इतकी दाट वनराई पाहायला मिळत नाही. इथे फक्त वनराई आहे असंच नाही तर इथं खूप जंगली प्राण्यांचा वावरही आहे. अर्थात तिथं नेहमी राहणाऱ्यांनी अनेकदा मार्जार श्रेणीतील पट्टेरी वाघ आणि बिबट्या अशा दोन्ही शिकारी प्राण्यांचं दर्शन घेतले आहे. कोण्या पर्यटकाला हा योग लाभला असेल असं मला तरी माहिती नाही. पूर्वेला म्हणजेच डाव्या बाजूला गड नदीचे पात्र तर पश्चिमेला म्हणजे उजव्या बाजूला अथांगसागर तीर या दोन्हीच्या मध्ये तोंडवली आणि तळाशील ही गावे वसलेली आहेत.

आचरा-देवगड हमरस्ता हा सड्यावर आहे.. आपण तोंडवळी फाटा घेतला की उंची कमी होत जाते आणि आपण हळूहळू समुद्रसपाटीला येतो. या विस्तीर्ण सड्यावर जंगल आहे त्या जंगलामध्ये पट्टेरी वाघ राहत असे असं स्थानिक सांगतात. पुढे भक्ष कमी झाल्यानंतर त्यांचा वावर कमी झाला पण बिबट्या वाघ मात्र दिसतो असं इथे सांगितलं जातं. या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या शिवालयामध्ये मुख्य भक्त म्हणून वाघाला मान मिळालेला आहे त्यामुळे इथल्या देवळाचं नाव आहे वाघेश्वर देवस्थान.

गावात शिरण्यापूर्वी उजवीकडे आपल्याला दिसते तिथली प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्र आणि डाव्या बाजूला थोड्याशा झाडीतून काही दगडी पायऱ्या वर जाताना दिसतात. तिथे अडीच फूट लांब रुंद असलेली एक गुहा किंवा मानवनिर्मित दगडी खोली आहे. तिथं बिबट्या वाघाचा अधिवास आहे असं ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी कधी कधी तुम्हाला अचानक व्याघ्रदर्शन होऊ शकतं पण आजतागायत कोणत्याही मनुष्याला इथं बिबट्यांनी कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवल्याचे ज्ञात नाही.

कधी कधी हे बिबटे वाघेश्वराच्या मंदिरातही दिसलेले आहेत त्यापैकी दोघांच्या समाध्या ही आपल्याला मंदिरात पाहता येतात. बिबट्या म्हणजे वाघा पेक्षा थोडा छोटा असलेला शिकारी त्यामुळे गावाच्या माणसाच्या संपर्कात आला तर गुरांची किंवा घरातल्या कुत्र्यांची शिकार होणार यात काही नवीन नाही. पण तशाही घटना इथे अनुभवल्याचं कोणी सांगत नाही एक हे एक विलक्षण सहजीवनाचे उदाहरण म्हणता येईल.

क्षणभर अशी कल्पना करा की भल्या पहाटे तुम्ही तोंडवळीच्या समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करायला निघालेले आहात आणि तुमच्या पासून दूर काही अंतरावर एखादा बिबट्या त्याच्या एक दोन पिल्लांना घेऊन जात असताना दिसला तर मला भीती वाटेल की हा अनुभव गंमतशीर वाटेल आता तरी सांगता येत नाही.

मंदिरासमोरच एसटी स्टँड असल्यामुळे तिथे एक रिकामी जागा आहे तिथे माझं लक्ष वेधून घेतलं एकाच मार्गाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्र घडावा म्हणून ज्या मंडळींनी बलिदान दिलं त्यांच्यापैकी एक या गावातील आहे त्यांचं हे स्मरण स्थळ.

इथे एखाद्या होम स्टे मध्ये राहायचं आणि मग गर्दी नसलेल्या समुद्रकिनाऱ्याचा पुरेपूर आनंद उपभोगायचा विशेषतः सकाळच्या वेळेला सूर्योदयानंतर लगेच या किनाऱ्यावर चांगली लांबलचक 11 नंबरची बस नेता येते.

इथून पुढे मालवण कडे जाताना वाटेत सर्जेकोटचा फाटा लागतो सर्जेकोट बंदरावरनं किंवा सर्जे कोट किल्ल्याच्या दिशेने जर तुम्ही गड नदीच्या खाडीकडे किंवा मुखाकडे पाहिलं तर वाळूची सुंदर पुळण आणि या दांड्याचा शेवटचा भाग आपल्याला पाहता येतो जर शक्य झालं तर जरूर पहा
कहाणी गड नदीची
कोकणातील पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हे समीकरण अगदी पक्के मानले जाते. इथले समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे हे सगळं तर सुंदर आहेच.. परंतु केरळच्या बॅकवॉटर्स शी बरोबरी करू शकतील अशी नदीची खोरी आणि खाड्याही इथं आहेत. इथल्या नद्यांच्या प्रवाहातून प्रवास करत असताना निसर्गाचा अविष्कार आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. पण अजूनही या ठेव्याची किंमत पर्यटकच काय स्थानिक जनतेलाही पूर्णतः पटलेली नाही. लांबीच्या बाबतीत फार मोठ्या नसलेल्या या नद्या वर्षभर शांत निवांत प्रवाहाच्या स्वरूपात वाहत असतात. पण पावसाळा आला रे आला की कोकणातील नद्यांचे प्रवाह रौद्र रूप धारण करतात आणि वेगाने समुद्राकडे झेपावतात.

सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या या नद्या अनेक उपनद्यांना सोबत घेत अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि मुखापाशी अद्भुत सौंदर्य पाहण्याची आपल्याला संधी देतात. मालवण तालुक्यातील अशीच एक महत्वाची नदी म्हणजे गड नदी. भुदरगड येथे उगम पावलेली गड नदी 84 किमी चा प्रवास करून तळाशील येथे समुद्राला मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र 1036 वर्ग किलोमीटर आहे.

नदीच्या स्वच्छ प्रवाहातून तळ स्पष्ट दिसतो. दोन्ही बाजूला हिरवी वनराई सावली धरून असते. कसाल आणि जानवली या दोन मोठ्या उपनद्या गड नदीत येऊन मिळतात. जानवलीचा परिसर फारच सुंदर आहे.

कसाल नदीची लांबी सुमारे 30 किलोमीटर आहे तर जानवली नदीची लांबी 33 किलोमीटर आहे. कणकवलीहून आचऱ्याकडे जाणारा रस्ता गड नदीला समांतर वाहतो. या प्रदेशात मसुरे, बांदिवडे अशी नितांतसुंदर गावे आहेत. भरतगड आणि भगवंतगड असे दोन किल्लेही आहेत.

रामगड नावाचा एक महत्त्वाचा किल्ला गड नदीच्या काठावर एका टेकडीवर बांधलेला आहे. जांभा दगडातील तटबंदी, जुन्या तोफा, गणपतीची सुंदर मूर्ती, की स्टोन ने बांधलेल्या कमानींचे दरवाजे असं इथं खूप काही पाहण्याजोगे आहे ते या ब्लॉगवर वाचा

भूदरगड वन्यजीव उद्यान परिसरात उगम पावलेली गड नदी नारडवे येथील धरण पार करून कणकवली मार्गे पश्चिमेला वळते. मसुरे नंतर प्रवाह नैऋत्य दिशेला वळतो आणि कालावल खाडी पुलाजवळ येतो. तिथं एक अतिशय सुंदर गाव आहे.. त्याचं नाव हडी गाव.. विविध पर्यावरणपूरक कल्पना इथल्या ग्रामपंचायतीने राबवल्या आहेत. त्या या दुव्यावर पाहता येतील. इथेच गड नदीच्या पात्रात पाणखोल जुवा आणि खोत-जुवा नावाची बेटे आहेत. या बेटांवर वस्ती आहे नदीतील ग्रामजीवन अनुभवायला इथं नक्की यायला हवं.

गड नदीच्या मुखाशी जो उथळ भाग आहे तिथं जवळजवळ ९ किमी लांब वाळूचा दांडा आहे. त्यामुळे या परिसराचे निसर्गसौंदर्य अद्वितीय आहे. पश्चिमेला अथांग सागर आणि पूर्वेला गड नदीचे पात्र यांच्यामध्ये तोंडवळी आणि तळाशील चे समुद्रकिनारे आहेत. तोंडवळीला सुरु आणि इतर झाडांचे वन आहे. या घनदाट वनराईत वाघही येतो असे स्थानिक सांगतात. तिथलं व्याघ्रमंदिर आवर्जून पाहायला हवं असं आहे. मुखाच्या दक्षिण बाजूला सर्जेकोट बंदर आहे आणि सर्जेकोट किल्लाही इथं पाहता येतो. केरळच्या बॅकवॉटर टूर्स प्रसिद्ध आहेत. तशी भ्रमंती गड नदीच्या पात्रातूनही करायला हवी.
दापोली तालुक्यातील छोट्या नद्या

भारजा नदीच्या दक्षिणेला आणि वाशिष्ठीच्या उत्तरेला दापोली तालुक्यात काही छोट्या नद्या आहेत. त्यापैकी सगळ्यात उत्तरेला आहे रत्नागिरीतील भोमडी येथे उगम पावणारी आणि आडे येथे १७ किमी प्रवास करत समुद्राला मिळणारी लाईन नदी.
कशेडी घाटाजवळ देवडोंगर येथे जोग नदीचे उगमस्थान आहे. पाचशे मीटरहून जास्त उंचीवरील हे ठिकाण आहे. जोग नदी ४५ किमी प्रवास करत आंजर्ले येथे सिंधुसागरात विलीन होते.

दाभोळच्या उत्तरेला कोळथरे जवळ पंचनदी नावाचे गाव आहे. कोळथरे किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला पंचनदी समुद्रात विलीन होते. सरिताकोश आणि इतर साधनांमध्ये या नदीचा विशेष उल्लेख आढळत नाही.
विलोभनीय कुंडलिका

उत्तरेला रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला, दक्षिण तीरावर भूशीर आणि त्यावर विराजमान कोर्लई किल्ला आणि अथांग सागरात विलीन होणारं नदीचं पात्र … कुंडलिका नदीच्या मुखाशी हा विलोभनीय देखावा पाहायला मिळतो. भिरा येथील विद्युत निर्मिती केंद्रातून दरररोज 750 क्युसेक पाणी कुंडलिका नदीत सोडले जाते. पुण्यातील मुळशी तालुक्यात कुंडलिका नदीचा उगम होतो आणि देवकुंड, कळंबोशी, डोलवहाळ धरण, कोलाड, रोहा, नवखार मार्गे रेवदंड्यापर्यंत कुंडलिका 84 किमी प्रवास करते आणि एकंदर 1070 वर्ग किमी क्षेत्र पाणलोट क्षेत्राखाली येते. माणगाव आणि रोहा तालुक्यातील साधारणपणे 13350 हेक्टर क्षेत्रफळात शेतीला कुंडलिका नदी सिंचन करते.

कुंडलिका नदीच्या खोऱ्यात राफ्टिंग आणि कॅम्पिंग साठी अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी विकसित करण्यात आली आहेत. आंबे आणि कलिंगड या भागातील मुख्य फलोत्पादन आहे आणि भात व नाचणीच्या पिकाचे उत्पादन या भागात मोठ्या प्रमाणावर होते. सांबरकुंड, रामराज अचलबाग आणि बाळे या उपनद्या कुंडलिका नदीला येऊन मिळतात. मोगल काळात रेवदंडा हे महत्त्वाचे बंदर होते. अगदी १८८३ पर्यंत २० किलोमीटर आत ५० टनांच्या बोटी जाऊ शकत असत. रोह्यापर्यंत भरतीला वाहतूक १५ टन बोटींनी केली जात असे.

कोर्लई गावाची खास गंमत म्हणजे इथली विशेष भाषा. ही भाषा मराठी, पोर्तुगीज आणि इंग्लिशच्या मिश्रणातून निर्माण झाली असून तिला स्थानिक लोक ‘नो लिंग’ म्हणजे आमची भाषा असे म्हणतात. चौल-रेवदंडा भागाला जवळवळ दोन हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे आणि एक प्रमुख जागतिक व्यापारी पेठ म्हणून चौल प्रसिद्ध होते. चेउल, चिवेल, जैमूर अशा विविध नावांनी ते ओळखले जात असे. आता साळाव येथे जिंदाल साऊथ वेस्टचा कारखाना असून विक्रम विनायक मंदिर नावाचे सुंदर गणेश मंदिरही पाहता येते.
रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला

रेवदंड्याचा आगरकोट हे उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांचे पहिले लष्करी ठाणे होते. इसवीसन १६३४ मध्ये अंतोनिओ बोकारो ने लिहून ठेवलेल्या माहितीप्रमाणे २०० पोर्तुगीज आणि ५० स्थानिक ख्रिस्ती लोकांची घरे होती आणि या सर्व घरांमध्ये काम करण्यासाठी प्रत्येकी एक गुलामही होता. किल्ल्यात २ शस्त्रागारे होती. भव्य कॅथेड्रल, रुग्णालय, जेझुइट चर्च, ऑगस्टीनियन चर्च, सेंट सॅबेस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च, अलिबागहून मुरुडकडे सागरी महामार्गाने भ्रमंती करत जात असताना चौल ओलांडून रेवदंडा गाव गाठले की कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर बांधलेला हा पोर्तुगीज दुर्ग पाहता येतो.

डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा किल्ला पसरलेला आहे आणि त्याचा तट फोडूनच आजचा मार्ग काढण्यात आला आहे.मदर ऑफ गॉड कॅपुचिन चर्च अशा दहा मोठ्या इमारती होत्या असा बोकारोच्या लेखनात उल्लेख आहे. या सगळ्या बांधकामांच्या देखभालीसाठी वार्षिक रुपये २४४८ रुपयांची तरतूद करण्यात आली होती असे पोर्तुगीज कागदपत्रं सांगतात.

सोळाव्या शतकापासून इथं पोर्तुगीजांनी एक महत्त्वाचे लष्करी ठाणे आणि व्यापारी बंदर वसवले होते. चीन, पर्शियन आखात, लाल समुद्र अशा अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी चौल बंदराचा संपर्क होता. लाकडी वस्तू, रेशीम, कॉटनची वस्त्रे, मलमल अशा अनेक गोष्टींची निर्मिती आणि व्यापार चौलच्या माध्यमातून होत असे. १६२५ ते १६३४ या काळात किल्ल्याचा विस्तार करण्यात आला. १६३५ ला उत्तरेचा तर १६३८ ला दक्षिणेचा दरवाजा दुरुस्त करण्यात आला. १६५६ पर्यंत हे नवे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसते.

या दुर्गाचे नामकरण पोर्तुगीजांनी साओ पेद्रो ए साओ पाऊलो दे चौल असे केले होते. उत्तरेचा दरवाजा जमिनीकडील म्हणून त्याचे नाव पोर्टा डे टेरा असे करण्यात आले आणि त्याला संरक्षण देण्यासाठी खंदक खणण्यात आला. दक्षिणेकडील दरवाजा हा बंदराच्या दिशेने उघडत असे म्हणून त्याचे पोर्ट डॉ मार असे बारसे करण्यात आले. इथं एक शिलालेख आहे ज्यात १५७७ मध्ये हे बांधकाम अलिक्सान्द्रे डिसोझा फ्रेयर च्या काळात झाले अशी नोंद वाचता येते.

जमिनीकडील दरवाजाजवळ सापडलेला शिलालेख आता मुंबईच्या संग्रहालयात आहेत त्यात किल्ल्याचा कप्तान जोआओ दे थोबार वॅलेस्को ने १६३५-३६ मध्ये इथं डागडुजी करून किल्ल्याला भक्कम केल्याची नोंद आहे. तिथं आता एक मरीआई देवीचे छोटे मंदिरही दिसते. १७२८ साली या ठिकाणी आढावा घेणाऱ्या आंद्रे रिबेरो कुटिन्हा या अधिकाऱ्याने किल्ल्याला १५ बाजू, ११ बुरुज आणि ५८ तोफा असल्याचे सांगितले आहे.

किल्ल्याच्या पूर्वेला खाजण असून संरक्षक खंदक मात्र इथं तितका स्पष्ट दिसत नाही. उत्तरेकडून या जागेला मराठ्यांचा धोका होता. दक्षिणेकडे पोर्तुगीज नौदल सुसज्ज असायचे.

समुद्राकडील दरवाजावर अशी पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेली दिसतात. ती पाहून आत असलेलं मॅट्रीज चर्च अवशेषरूपात पाहायचं. मॅट्रिझ चर्चचे बांधकाम १५३४ मध्ये सुरु केले गेले तिथं नोसा सेन्योरा डो मार म्हणजेच अवर लेडी ऑफ द सी या रूपात इथं मेरीची अर्चना केली जाते.

मॅट्रिझ चर्चजवळ एक चौकोनी बुरुज आहे. हा बालेकिल्ल्याचा भाग आहे. त्याच्या दर्शनी भागावर पोर्तुगीज चिन्हे कोरलेली दिसतात.

खाली सेंट पीटर आणि सेंट पॉल या दोन संतांच्या प्रतिमाही आहेत. ज्यांच्यावरून या किल्ल्याला नाव दिले गेले. चौकोनी बुरुजाजवळ १५१६ साली एक छोटी वखार बांधली गेली व पुढे १५२१ ते १५२४ हे बांधकाम पूर्ण झाले.

पोर्तुगीज रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आणि अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने इथं अनेक चर्च आणि मठांचे बांधकाम दिसते. आता बरीच पडझड होऊन नुकसान झालेले असले तरीही मूळ आकाराची भव्यता इथं सहज लक्षात येते. डॉमिनिकन चर्च आणि मठाचे बांधकाम या कोटात १५४९ च्या आसपास झाले.

सेंट झेवियरचे छोटे चॅपल किल्ल्याच्या नैऋत्य भागात आहे. छोटेसेच असले तरीही स्थानिक दगडात केलेले प्रमाणबद्ध बांधकाम आवर्जून पाहण्यासारखे आहे.

जेझुइट या अतिशय कडव्या पंथाच्या साधकांची इमारतही किल्ल्यात आहे. इसवीसन १५७० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या सैन्याने इथं वेढा दिला आणि त्या हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचा विध्वंस झाला आणि काहींचे बांधकाम पुन्हा केले गेले. काही इमारतींचे अस्तित्व मात्र अवशेषरूपातच पाहता येते.

रस्त्याच्या दिशेने आलं की आपल्याला ऑगस्टीनियन चर्चचा टॉवर दिसतो. हे बांधकाम १५८८ मध्ये केले गेल्याचं अँटोनियो बोकारो सांगतो.

या ठिकाणी नजरेत भरणारी अशी एक भव्य वास्तू अजूनही टिकून आहे, ती म्हणजे फ्रान्सिस्कन चर्च आणि मठाच्या जागी असलेला २९ मीटर उंच सातखणी बुरुज.
फ्रान्सिस्कन चर्चचे बांधकाम १५३४ साली झाले आणि हा प्रचंड मोठा मनोरा १६८८ च्या सुमारास बांधला गेला. मनोऱ्याच्या आत जाऊन वर पाहिले की त्याची भव्यता अधिकच जाणवते. झरोक्यांतून येणारा प्रकाश अधिकच नाट्य निर्माण करतो.

बोकारोच्या लिखाणात ९ बुरुज आणि त्यांच्यावर तैनात केल्या गेलेल्या तोफांची नावे येतात. नदीकडील पहिल्या बुरुजावर १८ पौंडी कॅमल तोफ आहे. चौथ्या बुरुजावर १८ पौंडी कॅमल तोफेच्या जोडीला ६५ पौंडी लोखंडी गोळे फेकणारी तोफही आहे. पाचव्या बुरुजाचे नाव सॅम पावलो असून त्यावर १६ पौंडी पितळी तोफ होती. सहाव्या बुरुजाचे नाव सॅम डिनीझ त्यावर १४ पौंडी दगड आणि लोखंडी गोळे फेकणारी तोफ होती. सातव्या बुरुजावर ४० पौंडी दोन ईगल तोफा होत्या आणि नवव्या बुरुजावर २४ पौंडांची लोखंडी तोफ होती असे पोर्तुगीज दस्तऐवज सांगतात. सातखणी बुरुजाजवळ काही ऐतिहासिक तोफा पडलेल्या दिसतात.

इथं पूर्वी एक रुग्णालय आणि सेवाभावी संस्था होती, पोर्तुगीजांनी त्याला मिसरीकॉर्डिया असे नाव दिले होते. असे बांधकाम वसईच्या किल्ल्यातही आहे. नकाशावरून त्याच्या अवशेषांच्या स्थानाचा अंदाज येतो.

ओहोटीच्या वेळेला किल्ल्याची समुद्राकडील भिंत पाहायला रेवदंड्याच्या किनाऱ्यावर जायचे. लांबलचक दगडी तटबंदी आणि त्यातून डोकावणारे माड अशा दृश्याचा अनुभव घ्यायचा. ओहोटीची वेळ संध्याकाळची असेल तर पश्चिमेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ही भिंत उजळून निघते.

रेवदंड्याच्या दक्षिण टोकाला कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. तिथून समोरच चौलच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला कोर्लई किल्ला दिसतो.

आणि कुंडलिका नदीवरील पूल ओलांडून पलीकडे गेलं की आगरकोटाची भिंत आणि त्यामागचा गर्द हिरवा आसमंत निरखत बसायला मजा येते. मागे चौलची टेकडीही दिसते.

आपल्या लाडक्या कोकणाचा ऐतिहासिक वारसा हा दोन हजार वर्षांपेक्षा जुना आहे आणि चौल-रेवदंडा हे क्षेत्र कोकणातील अनेक प्राचीन क्षेत्रांपैकी एक मानले जाते. वसई आणि गोव्याप्रमाणेच कोर्लई-रेवदंडा ही पोर्तुगीजांची बलाढ्य ठाणी. त्यांची गोष्ट दर्या फिरस्तीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. कोकणात अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणाची रेलचेल आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी दर्या फिरस्ती ब्लॉग वाचत राहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांनाही नक्की सांगा ही विनंती.
संदर्भ –
१) कुलाबा जिल्हा गॅझेट
२) Portuguese
Sea Forts Goa with Chaul, Korlai and Vasai – Amita Kanekar – published
by Jaico, funded by the Deccan Heritage Foundation
3) Notes on history and antiquities of Chaul & Bassein – Jose Gerson Da Cunha – Notes by Ms Deepti Bapat
कोर्लई चा फिरंगी किल्ला

कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे. आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार कोर्लई चा किल्ला. या ठिकाणाला Morro De Chaul म्हणजे चौलचा डोंगर असे पोर्तुगीज नाव होते. कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर मुखापाशी रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला आहे त्यामुळे या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सैनिकी जल वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण करणे या दोन किल्ल्यांच्या मदतीने शक्य होत असावं.

कोर्लई गाव या किल्ल्याच्या पायथ्याशी असून पूर्वेकडे गावातून आणि पश्चिमेकडे दीपगृहाकडून अशा दोन वाटांनी किल्ल्यावर जाता येते. या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर आहे तो बालेकिल्ला ज्याला पोर्तुगीजांनी फोर्टलेझा रियल (राजेशाही दुर्ग) असे नाव दिले होते. भूशिराच्या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आहे आणि समुद्राकडे उघडणारे दार. या दोन भागांना जोडणारी दगडी तटबंदी बालेकिल्ला ते समुद्र अशी सहा भागांमध्ये उतरत गेली आहे.

गावातून पायऱ्या आणि पायवाटेने चढून आल्यावर दिसणारे बालेकिल्ल्याचे दार शाबूत आहे. त्याच्या कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झाले असावे असा आभास निर्माण होतो. या दारावरच गोलाकार साओ पेद्रो बुरुज बांधलेला दिसतो.

तिथून आत आल्यानंतर दक्षिणेकडे पाहिले तर अथांग समुद्र अन कोर्लई गावचा किनारा आपल्याला दिसू शकतो. तिथंच एक तोफ अजूनही पडलेली आहे. या वास्तूत इतिहासाच्या पाऊलखुणा तोफांच्या रूपाने आणि शिलालेखांच्या रूपाने विविध ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणच्या कात्रीच्या आकारातील बुरुजांच्या रचनेचे Orelha De लिब्रे म्हणजे सशाचे कान असे बारसे केलेले आहे.

सेंट इनॅसिओ, सेंट फ्रान्सिस्को अशा विविध संतांची नावे इथल्या बुरुजांना दिलेली आहेत आणि काही ठिकाणी तसं कोरलेले दगडी लेखही आपल्याला दिसू शकतात. बालेकिल्ल्यात जाताना अनेक दरवाजे आणि बंदिस्त रस्ते पार करत आपण आतमध्ये प्रवेश करत जातो.
इथून पुढे जात असताना कात्रीच्या आकाराचं बुरुजाचे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या वास्तुरचनेवर पोर्तुगीज बांधकामाची छाप जागोजागी स्पष्टपणे दिसते.

किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याच्या झाडाला बहर आलेला पाहताना खूप छान वाटतं. तिथेच रत्नेश्वराचे ठिकाण आणि तुळशी वृन्दावनही दिसते.

पोर्तुगीज काळात बांधलं गेलेलं नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसलं तरीही त्याचं बांधकाम आणि वेदीची म्हणजेच आल्टर ची जागा आपल्याला नीट पाहता येते.
इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवीसन १६४६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. मे १६५० मध्ये चौलचा कॅप्टन फर्नाव दे मिरांडा हेन्रीक्स इथला कप्तान क्रिस्तोवाव दे अब्र्यू दे अझवेदो यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.

उत्तरेकडे आपण अनेक बुरुज आणि दरवाजांची मालिका ओलांडत समुद्राच्या दिशेने चालत जाऊ शकतो. जसजसे आपण या अरुंद माथ्यावरून उत्तरेला जातो तसतशी टेकडीची उंची कमी होते आणि आपण किनाऱ्याकडे उतरत जातो.
समुद्रसपाटीवर जाऊन पोहोचले की दोन दरवाजे दिसतात. पश्चिमेकडे असलेला दरवाजा समुद्राभिमुख आहे तर पूर्वेचा दरवाजा कुंडलिका नदीचे मुख आणि तिथं असलेल्या जेटीच्या बाजूला उघडतो.
इथं कॅव्हेलेरो नावाचा प्रचंड बुरुज असून अनेक कमानींचे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. त्याला लागूनच सांताक्रूस बुरुज आहे. अनेक तोफा इथं मांडलेल्या आपल्याला दिसू शकतात.

संध्याकाळपर्यंत ही भटकंती आटोपून पुन्हा एकदा किल्ल्याच्या माथ्यावर चढून यायचे. पश्चिमेचे रंग आता आकर्षक होऊ लागलेले असतात. जवळजवळ पाचशे मीटर लांब असलेली दगडी तटबंदी सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली असते.

कोर्लई गावाला अतिशय सुंदर असा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. नितळ निळे पाणी आणि फेसाळणाऱ्या लाटा पाहता पाहता संध्याकाळ ओसरू लागते आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा नारिंगी रंग या निळाईत शिरू लागतो. १५२१ मध्ये इथं धक्का, तटबंदी आणि क्रूसाची बातेरी बांधण्याची परवानगी पोर्तुगीजांनी दिएगो लोपेझ दे सिक्वेरा मार्फत निजामशाहीकडे मागितली होती. पहिला बुऱ्हाण निजामशहा गेल्यावर जे अराजक माजले त्याचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी १५९४ साली इथं जम बसवण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामशहाने पोर्तुगीजांना हाकलून इथं स्वतः दुर्ग बांधण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात दोघेही मागे हटले.

त्यानंतर दुसऱ्या बुऱ्हाण निजामाने ही जागा जिंकून रेवदंड्याच्या पोर्तुगीज किल्ल्याला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला. १५९२ साली रुपी खान नामक सरदाराबरोबर मोठी कुमक आणि तोफखाना देऊन निजामशाहीने कोर्लईवर कब्जा केला आणि बुऱ्हानदुर्ग नामक किल्ला बांधून काढला. त्याचे अवशेष काही ठिकाणी आजही बांधकामात दिसू शकतातत्यानंतर इथूनच रेवदंड्यावर तोफखान्याचा हल्ला सुरु झाला. आजही कोर्लईच्या पूर्व तटावरून रेवदंड्याची सातखणी म्हणजेच सांता बार्बाराचा मनोरा स्पष्ट दिसतो..

१५९४ साली कोर्लई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. सुमारे चार हजार सैनिकांची फौज घेऊन हल्ला केला आणि कोर्लई जिंकला. या लढाईत त्यांना ५ हत्ती अनेक घोडे आणि ७७ तोफा मिळाल्या व निजामशाहीचे हजार सैनिक ठार झाले. पोर्तुगीजांची मात्र २१ माणसे कामी आली. त्यानंतर पुरेशी शिबंदी नसल्याने पोर्तुगीजांनी बुऱ्हानदुर्गाचे बांधकाम पाडून टाकले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश लाभलं नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी कोर्लई जिंकून घेतला.

इतिहासाच्या अद्भुत जगात भ्रमंती करत असताना सूर्य मावळतीला जातो आणि पश्चिमेला क्षितिजावर अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. समुद्राचे पाणी आता सोनेरी दिसायला लागलेले असते आणि त्यावर एखाद्या मासेमारी बोटीचा ठिपका आपलं लक्ष वेधून घेत असतो.

कोर्लई किल्ल्याच्या पश्चिमेला असलेले दीपगृह नक्की पाहायला हवे मात्र ते पाहण्यासाठी संध्याकाळची ठराविक वेळ गाठावी लागते. कोर्लई गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक ख्रिस्ती कुटुंबे आहेत जी एक विशेष भाषा बोलतात. पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांच्या संगमातून घडलेल्या भाषेला ते नो लिंग म्हणजे आमची भाषा असे म्हणतात. विशेष म्हणजे लिपी म्हणून ते देवनागरी वापरतात. दर्या फिरस्ती कोकणातील अशा अनेक अद्भुत ठिकाणांची चित्रयात्रा आहे. या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांनाही दर्याफिरस्ती बद्दल सांगा ही आग्रहाची विनंती.
तेरेखोलचा स्वातंत्र्य दुर्ग

दर्या फिरस्तीच्या महाराष्ट्र टप्प्याचा प्रवास जिथं संपतो किंवा जिथून सुरु होतो ते एक निसर्गरम्य, शांत असं ठिकाण आहे. भौगोलीकदृष्टीने म्हणाल तर महाराष्ट्रात पण राजकीय दृष्टीने गोव्यात. तेरेखोल नदीच्या मुखाशी एका डोंगरावर बांधलेला किल्ला .. त्याचं नावही फोर्ट तिराकोल किंवा तेरेखोल किल्ला. आता आरोंदा गावाजवळ किरणपाणी येथे पूल झाल्याने गोव्यातून इथं येणं खूप सोपं झालं आहे.
तेरेखोल नदीला बांदा नदी म्हणूनही ओळखलं जातं. सुमारे २८ किमी लांब असलेल्या या नदीचं महत्त्व एकेकाळी दळणवळणासाठी विशेष मानलं जात असे. काही अभ्यासकांच्या मते तीर खोल वरून तेरेखोल अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. या नदीचा उगम मनोहरगड येथे सह्याद्री पर्वत रांगेत होतो आणि पात्रादेवी नावाच्या ठिकाणी ही नदी गोव्यात प्रवेश करते. गोवा राज्यातील ही सर्वात उत्तरेची नदी असून तिला तोरसे, खडशी आणि पेडणे नावाच्या मुख्य उपनद्या आहेत.

हा किल्ला गोवा राज्य पर्यटन विभागाच्या ताब्यात होता तो त्यांनी एका खासगी विकसकाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये परावर्तित केला आहे. तिथं राहणं महागडं काम असलं तरीही परवडत असेल तर एक दिवस अनुभव घ्यायला हरकत नाही कारण दगडी तटबंदीखाली मस्त नैसर्गिक गारवा अनुभवत इथं पडून राहता येतं.. गोव्याच्या भाषेत ज्याला सुशेगात म्हंटलं जातं… या किल्ल्याची निर्मिती १७व्या शतकात सावंतवाडीचे राजे खेम सावंत भोसले यांनी केली. पुढं १७४६ मध्ये पोर्तुगीज व्हाइसरॉय पेद्रो मिगेल दे अल्मिडा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज आरमाराने खेम सावंतांचा पराभव करून हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याला जोडला. पूर्वी या किल्ल्यावर १२ तोफांची शिबंदी होती. आता पोर्तुगीज पद्धतीने नवीन बळकट बुरुज बांधले गेले.

या किल्ल्यात सेंट अँथनीचे चर्च आहे आणि समोरच क्रुसावरील येशूचा पुतळा. किल्ल्याचे बुरुज पोर्तुगीज धाटणीचे असून नवीन बांधकामही त्याच शैलीत केले गेले आहे. किल्ल्याच्या उत्तर टोकाला किनाऱ्यापर्यंत बांधलेली संरक्षक तटबंदी आपण पाहू शकतो. तेरेखोल नदीच्या मुखावर पहारा ठेवण्याची कामगिरी हा किल्ला करत असे.

इथं राहणं महागडं असलं तरीही तेरेखोल नदी आणि केरी किनाऱ्याचे सुंदर दृश्य पाहता येईल अशा रेस्तरॉं मध्ये बसून भोजन आणि मदिरापानाचा आनंद घेणे शक्य आहे. ज्यांना किल्ला नुसताच पाहायचा आहे त्यांनाही हा परिसर रजिस्टरमध्ये नोंदणी करून पाहता येतो.

नदी पल्याड केरी नावाचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. तिथून फेरीतून गाडी/ दुचाकी घालूनही तेरेखोलला पोहोचता येते. किंवा जर दर्याफिरस्ती गोमंतकातही सुरूच ठेवायची असेल तर तेरेखोल ते केरी असेही जाता येते. गोव्यातील आरंबोळ, अश्वेम, मोर्जे अशा किनाऱ्यांकडे इथून जाता येते. सुमारे दीड तासाच्या प्रवासाने आपण मापसा मार्गे पणजीला जाऊ शकतो आणि दाबोळी येथील विमानतळ सव्वादोन तासांच्या अंतरावर आहे.

गोव्याचा प्रथम भारतीय व्हाइसरॉय डॉ बर्नार्डो पेरेस डिसिल्वा यांच्या नेतृत्वाखाली १८२५ साली इथं एक उठाव झाला आणि पोर्तुगीज राजसत्तेला झुगारून देण्याचा प्रयत्न झाला. परंतु टायगर किलर या उपाधीने प्रसिद्ध असलेल्या कमांडंट डा कुन्हा ने हा उठाव दडपून टाकला. १५ ऑगस्ट १९५४ रोजी गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी क्रांतिकारी तिरंगा झेंडा घेऊन या किल्ल्यात दाखल झाले आणि त्यांनी इथल्या ध्वजस्तंभावर भारताचा झेंडा फडकवला. पोर्तुगीज सरकारने या सत्याग्रहींना कैदेत टाकले. पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात या किल्ल्याला एक विशेष महत्त्व या घटनांनी मिळाले.

या ठिकाणाहून वेंगुर्ला तालुक्यातील स्थळे आणि सावंतवाडी शहर पाहणे सोपे जाते. आंबोली घाटातून उतरून सावंतवाडीला मुक्काम करणे आणि मग सकाळी सकाळी तेरेखोल दर्शनाला जाणे सोपे पडते. तिथं जवळच कनयाळे ची नवदुर्गा, रेडीचे गणेशमंदिर व यशवंतगड किल्ला अशी ठिकाणे पाहता येतात. कोकण किनाऱ्यावरील अशाच मोहक स्थळांची चित्र भ्रमंती करण्यासाठी या संकेतस्थळाला भेट देत राहा.
अलिबागचा सर्जेकोट

अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा हा उपदुर्ग. मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा. दगडांच्या चिऱ्यांच्या राशी रचून पाच बुरुजांचे हे बांधकाम केले गेले आहे. आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला आहे. जेणेकरून या जागेचा वापर करून किल्ल्यावर हल्ला करता येऊ नये. दगडांच्या पुलाने किंवा आजच्या भाषेत कॉजवे बांधून सर्जेकोट आणि कुलाब्याला जोडले गेले आहे. हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झाले आहे असे इतिहासकार मानतात.



हा किल्ला छोटासाच आहे. सुमारे २७ मीटर x २७ मीटर च्या चौरस भागात हे बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं. पाच बुरुजांच्या तटबंदीला उत्तरेकडून प्रवेश आहे. तिथं आता दाराची चौकट तेवढी शिल्लक असल्याचे दिसते. दारात दगडांची रास असल्याने काळजीपूर्वक आत जावे. दगड ओले असतील किंवा शेवाळे असेल तर घसरण्याची शक्यता असते. आत गेल्यानंतर एक विहीरही आपल्याला दिसते. तिथं खूप झाडोरा माजला आहे. पायऱ्या वापरून तटबंदीवर गेलं की पूर्वेला अलिबाग शहर पश्चिमेला अथांग समुद्र, दक्षिणेला कुलाबा किल्ला आणि तिथं असलेलं कांदळवन आणि उत्तरेला दूर क्षितिजावर खांदेरी आणि उंदेरी किल्ल्याचे ठिपके आपण पाहू शकतो.

भरती ओहोटीच्या वेळा सांभाळून सर्जेकोट आणि कुलाबा किल्ले पाहायचे आहेत. हल्ली बोटीने भरतीच्या वेळेला किल्ल्यावर सोडले जाते. ओहोटी असेल तर चालत जाता येते. पण स्थानिकांना विचारून जाणे केव्हाही उत्तम. सोपे गणित म्हणजे तिथीच्या पाऊण पट वेळ ही पूर्ण भरतीची वेळ असते. त्यानंतर ३ तासांनी ओहोटी लागते. आणि पुढचे साधारण दोन तास किल्ला पाहता येऊ शकतो.


कुलाबा किल्ल्यावरील सर्व ठिकाणे आणि सर्जेकोट एकाच खेपेत पाहायचे असेल तर मात्र वेळेचे नियोजन पाळून ही ठिकाणे पाहावी लागतील. कुलाबा किल्ल्याची सविस्तर माहिती तुम्हाला या स्वतंत्र ब्लॉगमध्ये पाहता येईल. कोकण किनाऱ्यावरील विविध ठिकाणांची माहिती आणि फोटो पाहण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा हे अगत्याचं आमंत्रण.
मेगन अबोथ सिनेगॉग

अलिबाग शहरात बेने इस्राएल समाजाची जवळजवळ १०० कुटुंबे राहत असत. पुढे १९५० नंतर ही संख्या कमी होऊन फक्त ७ वर आली. अलिबागच्या कोळीवाडा परिसरात मेगन अबोथ सिनेगॉग नावाचे हे ज्यू मंदिर आहे. हे मंदिर इसवीसन १८४८ च्या सुमारास बांधले गेले आणि आणि पुढे १९१० साली याचा जीर्णोद्धार केला गेला. निवृत्त ज्यू लोकांसाठी हे बांधले गेले असे सांगितले जाते.

अलिबागच्या या परिसराला इस्राएल आळी असे नाव आहे. कोची मधील यहुदी गुरु शेलोमो सालेम शूराबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम १८४८ मध्ये झाले आणि १९१० ची बांधणी लोकवर्गणीतून केली गेली. सॅम्युएल सॉलोमन माझगावकर यांनी वास्तुरचनेत मदत केली तर मोझेस सॅम्युएल वाकरुळकर यांनी बांधकामाचे पर्यवेक्षण केले हे तिथं लावलेल्या पाट्यांवरून लक्षात येते. सॉलोमन आरोन चारीकर वडीये यांनी सर्वेक्षण केले तर हानाबाई शापूरकर यांनी सभोवताली भिंत बांधण्यासाठी दान दिले.

डोरिक पद्धतीचे स्तंभ असलेल्या या बांधकामावर पोर्तुगीज शैलीचा प्रभाव जाणवतो. बांधकामाची सौंदर्यशैली निओ क्लासिकल धाटणीची आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या छज्जावरून महिलांना दर्शनाची सोय केली गेली. मी जेव्हा या ठिकाणी जानेवारी २०१८ मध्ये गेलो तेव्हा तिथं कुलूप लावलेले असल्याने बांधकाम आतून पाहता आले नाही. इस्राएल हून आलेल्या एका कुटुंबाची भेट घेण्याचा योग तेव्हा आला.
संदर्भ –
१. ज्यूईश हेरिटेज ऑफ डेक्कन – केनेथ रॉबिन्स आणि पुष्कर सोहोनी
२. इवोल्युशन ऑफ बेने इस्राएल अँड सिनेगॉग्स – इरिन जुडाह ( टिपणनोंदी – दीप्ती बापट)
गुहागरचा लक्ष्मीनारायण

या ब्लॉगचे प्रायोजक सिद्धेश काजरेकर आहेत. न्यू जर्सी येथील सिद्धेश यांच्या योगदानातून लक्ष्मी नारायण मंदिर, गुहागरचे चित्रण होऊ शकले.
गुहागर म्हंटलं की डोळ्यासमोर येतं ते व्याडेश्वराचे प्रशस्त देवालय आणि सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून वसलेलं एक अतिशय विलक्षण पर्यटन स्थळ. गुहागर म्हणजे व्याडेश्वर हे ऐतिहासिक समीकरण नाकारता येणार नाहीच, परंतु या ठिकाणी इतरही अनेक अतिशय प्रेक्षणीय मंदिरे आहेत ती सुद्धा आवर्जून पाहायला हवीत. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर. पेशवेकालीन बांधणीचे हे मंदिर म्हणजे मराठा शैलीच्या बांधकामाचा परिचय करून देणारी एक खास वास्तू आहे असं म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
गुहागरातून असगोळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीनारायण मंदिराचे शिखर आपले लक्ष वेधून घेते. सध्या (२०१९) या मंदिराला लाल रंगात रंगवून ताजे टवटवीत केले गेले आहे. पेशवाईतील एक महत्वाचे सरदार हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधले असे सांगतात. परंतु विश्वनाथ महादेव शास्त्री यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या श्री व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख आहे म्हणजे हे स्थान प्राचीन असावं.

मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप वरून ड्रोनने पाहिल्यास बांधणीतील गुंतागुंत आणि विविध कोनांतून विविध थरांच्या रचनेतून साधलेला प्रमाणबद्ध परिणाम लक्षात येतो. या पद्धतीत कोरीवकामातून साधलेल्या सजावटीपेक्षा भौमितीय रचनेतून एक वेगळी सौंदर्य दृष्टी दृष्टी अभिकल्पित केलेली दिसते. हे वैशिष्ट्य कोकणातील अनेक समकालीन मंदिरे पाहत असताना आपल्याला जाणवते.

मंदिरातील संगमरवरी मूर्ती ही श्री विष्णू लक्ष्मीची असून तिथेच गरुड मूर्तीही दिसते. या मूर्ती हरिपंत फडकेंनी पुण्याहून घडवून आणल्या होत्या असे सांगितले जाते. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात थंड वाटते. काही मिनिटे शांत बसून ध्यानस्थ होण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे.

इस्लामी धाटणीच्या कमानी आणि दगडी भिंतीमध्ये घडवलेले अलकोव (भिंतीत आत जाणारी पोकळी) अशी वेगळ्या प्रकारची बांधणी इथं दिसून येते. पेशवेकालीन मंदिरांमध्ये असं वेगळेपण दिसतं. खरंतर आपल्याकडे मंदिर जितकं प्राचीन असेल तितकं त्याला दिलं जाणारं महत्त्व वाढतं परंतु पुरातत्व दृष्टीने अठराव्या एकोणिसाव्या शतकात झालेल्या या रचना अभ्यासल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. या काळातील मंदिरांबद्दल अभ्यासक जॉन मिशेल काय म्हणतो ते पाहू –
Polygonal spired temples in Maharashtra and beyond – Another region which witnessed the evolution of unusual towered monuments is Maharashtra, where the Marathas commissioned a profusion of distinctive Hindu monuments in the 18th and 19th century. The typical Maratha temple is crowned with a twelve-sided, slender, tapering spire, constructed from plastered brickwork. The origin of this twelve-sided spire is obscured, being altogether unknown in the earlier temple architecture of Maharashtra and the adjacent zones. Such spires are usually relieved by superimposed tiers of Mughal styled niches headed by Bangla cornices, and crowned with diminutive petalled domical finials. Cubical turrets with Bangla cornices carrying curving Shikhara like towers often appear at rooftop corners. (Late temple architecture of India – 15th-19th centuries – George Michell. page no. 113 Innovations)

या ठिकाणी असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे खिडकीत असलेली जाळी. दुरून पाहिले तर खिडकीला जाळी आहे एवढंच दिसतं लक्षपूर्वक पाहिलं की समजतं हा नाग फॉर्म आहे आणि त्याच्या वेटोळ्यातूनच जाळीची निर्मिती केली गेली आहे.

मंदिरासमोर पुष्करणी तर मागच्या बाजूला विहीर आहे. कोणतेही ठिकाण पाहताना आपल्याला किती आनंद मिळेल हे त्या ठिकाणच्या सौंदर्याबरोबरच ते पाहण्याची आपली कुवत किती यावरही अवलंबून असते. आपण जितकं खुल्या दृष्टीने आणि बारकाईने पाहू तितकं नवं काही गवसत जातं. पूर्वी मी केवळ फोटोग्राफी करण्यासाठी भटकंती करत असे तेव्हा अनेक गोष्टी न पाहता काही चांगल्या फ्रेम्स मिळाल्या की पुढे निघायचो. डिझायनर म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्यात रचना, त्यासाठी वापरलेली साधने, सजावटी साठी वापरलेल्या आकृती याबद्दल कुतूहल निर्माण झालं.

साधारणपणे प्राचीन ते सुंदर असं आपण मानतो. कोकणात कर्णेश्वर सोडलं तर खूप प्राचीन मंदिरे पटकन डोळ्यासमोर येत नाहीत. पण अनेक पेशवेकालीन मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे. कोकणातील अशा वैविध्यपूर्ण ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या या ब्लॉगला भेट देत रहा हे अगत्याचे आमंत्रण. आणि ब्लॉग आवडला तर फेसबुक, व्हाट्सअप वर शेयर करायला विसरू नका.
दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण
गुहागर-वेळणेश्वर-हेदवी परिसरात भटकंती करत असताना आधी दशभुज गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि मग हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा हा नेहमीचा शिरस्ता. दरवेळी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलं की डाव्या बाजूला एका मंदिराची कमान आणि गर्द झाडीतून दिसणारी शिखरे खुणावत असत. यावेळी मुद्दाम वेळ काढून हे देऊळ पाहायचेच असं ठरवलं.

डावीकडे उतारावरील पायवाटेने सुमारे दीडशे मीटर दक्षिणेकडे गेले की पेशवेकालीन मंदिर स्थापत्य पद्धतीतील शिखरे दिसू लागतात. आखीव रेखीव प्रमाणबद्ध असं देऊळ पाहून आपल्याला कोकणच्या सांस्कृतिक पसाऱ्यातले एक रत्न सापडल्याचा आनंद होतो. कोणाची आराधना इथं होत असेल.. शिव-पार्वती, गणेश की लक्ष्मीनारायण असा विचार करत आपण सभामंडपात पोहोचतो. समोर अतिशय सुंदर अशी एक मूर्ती कोनाड्यात दिसते. गरुडाने खांद्यावर घेतलेले विष्णू-लक्ष्मी..


हेदवीचे गणेशमंदिर बांधून घेणाऱ्या केळकर स्वामींनीच याही देवळाचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. मूळ मूर्ती पाषाणातील असावी त्यावर नंतर संगमरवरी मूर्ती घडवली गेली. मागे असलेल्या प्रभावळीवर दशावतार तर आहेतच शिवाय कैलासावर असलेल्या शिवाचेही चित्रण आहे त्यामुळे या देवतेला दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण असे नाव मिळाले असावे.

मूर्तीची उंची सुमारे सव्वा मीटर असून मूर्तीच्या पायाशी लक्ष्मी, हनुमान, गरुड आणि इतर सेवकांच्या आकृती दिसतात. प्रभावळीत ध्यानस्थ शिवाबरोबरच काही युद्ध मुद्रेतील आकृती आणि दोन सिंह प्रतिमा सुद्धा आहेत…देवळातच देवाची पालखीही टांगून ठेवलेली आहे. मंदिराच्या सभामंडपात ओक आणि जोगळेकर या दोन साधकांच्या समाधीची जागा दिसते.


हा परिसर निसर्गाच्या आशीर्वादाने आणि विविध मंदिरांच्या कृपेने समृद्ध झालेला आहे. भर उन्हात भटकंती करण्यापेक्षा सकाळी लवकर आणि सायंकाळी समुद्रकिनारे पाहायचे आणि दुपारच्या वेळात मंदिरे पाहायची अशी योजना केली तर कमी दमणूक होते. हे देऊळही माधवराव पेशव्यांच्या काळातील असेल तर साधारणपणे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील. या काळात कोकणात बांधली गेलेली मंदिरे टुमदार आहेत आणि एका वेगळ्या स्थापत्यशैलीचा वारसा जपून आहेत. या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास आणि संशोधन व्हायला हवे. एखादा कोकणप्रेमी भारतविद्या निष्णात हे शिवधनुष्य उचलेल अशी आशा करूया.
हेदवीचा उमामहेश्वर
भगवान शंकराचा आणि निसर्गाचा विचार करताना डोळ्यासमोर येणारं निसर्गरूप म्हणजे हिमालयाचा मुकुटमणी कैलास पर्वत आणि तिथून वाहत येणारी गंगा. पण कोकण आणि शिवाचा एकत्र विचार केला तर शिवाचे अढळ स्थान म्हणून समोर येतो अथांग सागर आणि त्याला सोबत देणारा किनारा. कितीतरी शिव-पार्वती रूपे कोकणात सागरतीरावर प्रतिष्ठापित झालेली दिसतात.. त्यापैकी सगळ्यात शांत, रम्य आणि समुद्रसान्निध्यात असलेलं ठिकाण म्हणजे हेदवी येथील उमामहेश्वर

हेदवी समुद्र किनाऱ्याच्या उत्तर टोकाला जिथं खडकाळ भाग सुरु होतो तिथं कच्चा रस्ता संपतो आणि आपण देवळाच्या सभामंडपात जाऊन पोहोचतो. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन आहे परंतु समोरचा सभामंडप मात्र हल्लीच बांधलेला असावा. फार पूर्वीपासून इथं शिव-पार्वतीचे देऊळ असावे पण आजचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या निधीतून १७७०-८० च्या सुमारास झाले असा उल्लेख केला जातो. उत्तर कोकणात नागावजवळ असलेले श्री वंखनाथ मंदिरही त्यांनीच दिलेल्या देणगीतून जीर्णोद्धारित झाले – त्याची गोष्ट इथे वाचता येईल.

जेव्हा जेव्हा मी या भागात भटकंतीला गेलो आहे तेव्हा तेव्हा ऊन-पाऊस यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून किंवा थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून इथं शांत बसलो आहे. इथला छोटेखानी नंदी आजच्या भाषेत खूपच क्यूट दिसतो. मंदिरामागे एक झरा आहे ज्यातून नैसर्गिक मिनरल वॉटर येत असतं. इथून पुढं भरतीच्या वेळेला खडकांतून वाट काढत गेलं की बामणघळ येते आणि निसर्गाचा अविष्कार पाहता येतो. शिवशंभो समोर नतमस्तक झाल्यानंतर समुद्राची गाज ऐकत बसलं की खूप छान वाटतं. सभामंडपाच्या सावलीत बसून लाटांची आवर्तने पाहता येतात.

या भागातील दशभुज गणपतीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पण उमामहेश्वर आणि दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण ही दोन सुंदर मंदिरे इथं पाहता येतात. पुढं नरवण ला व्याघ्राम्बरी देवीचे दर्शन घेता येते. रोहिले चा छोटासा किनारा पाहता येतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूत निराळा साज घेऊन हेदवी सजत असते. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नीलिमा देशपांडे या मैत्रिणीचे हेदवी गावावर खूप प्रेम आहे. हेदवीबद्दल बोलत असताना अनेक हृद्य आठवणींमध्ये ती रंगून जाते. कोकणावर निस्सीम प्रेम असलेले असे लोक भेटले म्हणजे लई भारी वाटतं.
हेदवीचा दशभुज गणेश

कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे.

या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे
म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हंटलं जातं. चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा,
आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची
लोंबी अशा गोष्टी हातांत दिसतात. सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे. अशा प्रकारच्या
गणेशमूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असते असा संकेत
आहे. त्यामुळे दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही. या मूर्तीची निर्मिती
काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितलं जातं. इथं जवळच
हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन उमामहेश्वराचे दर्शन घ्यायला हवे आणि
बामणघळ नावाचा निसर्गाचा अविष्कारही पाहायला हवा. कोकणातील अशाच भन्नाट
ठिकाणांची भटकंती करण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा.
संदर्भ –
साद सागराची गुहागर ते तवसाळ – सुधारित आवृत्ती २०१४- पराग पिंपळे, बुकमार्क पब्लिकेशन्स पुणे
कोकणातील २१ गणपती

कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. कोकणात अनेक ठिकाणे आहेत जिथं श्रीगणेशाचा अधिवास आहे. त्याची कायमस्वरूपी पूजा अर्चना केली जाते. अशी २१ ठिकाणे आज आपण या दर्या फिरस्ती ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली प्रतिमा आहे गणपतीपुळे आणि जयगडच्या मध्ये कचरे येथे असलेल्या जयविनायक मंदिरातील भव्य गणेशमूर्तीची

वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी मूषक मूर्ती सुद्धा सापडली.

गणपती म्हणजे विघ्नहर्ता. भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैचित्रपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच कहाणी आहे. गुहागरचा सागरतीर शांत, नीरव.. पाण्यात डुंबण्यासाठी तसा सुरक्षित मानला गेलेला. पण कोणे एके काळी, कदाचित ५०० वर्षांपूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर ग्राम गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून पश्चिमेला समुद्राकडे केलं आणि तेव्हा कुठं सागराचे थैमान संपले अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला म्हणून उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात श्रीधराने गुहागर वसवले तेव्हापासून ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे अशी नोंद आहे.

हे आहे कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायक गणेश मंदिर. या मंदिराचे बांधकाम रघुजी आंग्रे दुसरे यांनी १७६१ साली केले. मंदिराजवळ असलेली दीपमाळ खूप सुंदर आहे. इथं केलं गेलेलं कोरीवकाम नक्की पाहायला हवं. मला इथं पाहिलेलं तुळशी वृंदावन खूपच आवडलं होतं. इथं बाजूलाच शिवमंदिर आणि हनुमान मंदिरही आहे.

गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे.

कोकणात जात असताना अनेकदा पालीमार्गेच जाणे होते आणि अशा वेळेला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास होतो.

एलिफंटा लेणे म्हणजे एक प्रचंड मोठे शिवालयच. तिथं खांबावर कोरलेल्या गणेशप्रतिमा सुबक आहेत.

या विहिरींच्या जवळच एक गणेश मंदिर आहे. त्याच्या दोन दीपमाळांपैकी एक सुस्थितीत असून एकाचे तुकडे तिथेच विखुरलेले दिसतात. मंदिरातील गणेश मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. तिथंच काही क्षण बसून ध्यानस्थ होण्याची अनिवार इच्छा मला झाली.

आवासचे हे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले अशीही एक आख्यायिका आहे पण तिला लिखित आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत.

१८९० साली बांधले गेलेलं हे फडके गणपती मंदिर, मुंबईतील आद्य गणेशस्थानांपैकी एक म्हणावे लागेल.

मुंबईतील प्रभादेवी येथे असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर. आज इथं विसाव्या शतकात बांधलेली इमारत दिसते पण प्रथम मंदिर इथं १८०१ साली बांधलं गेलं होतं असं सांगितलं जातं.

मुंबईतील सर्वात जुनी श्री गणेशाची मूर्ती कुठं आहे असं कोणी विचारलं तर उत्तर आहे जोगेश्वरी लेण्यातील हे गणेश शिल्प. जवळजवळ ४-५व्या शतकातील ही गजाननाची प्रतिमा.

पन्हाळेकाजी लेण्यातील ही भव्य गणेशप्रतिमा अतिशय आकर्षक रीतीने कोरण्यात आलेली आहे.

पन्हाळेकाजीजवळच असलेल्या गौर लेण्यातही गणेशप्रतिमा पाहता येते. तिथं रिद्धी-सिद्धी श्रीगणेशाच्या सोबत आहेत.

दापोलीजवळ आंजर्ले येथे असलेला कड्यावरचा गणपती म्हणजे पेशवेकालीन स्थापत्याचा एक उत्कृष्ट अविष्कार आहे. या ठिकाणाहून समुद्र आणि सभोवतालच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात पूर्वी सोन्याची गणेशप्रतिमा होती. नंतर दुर्दैवाने दरोड्यात ती नष्ट करण्यात आली. आता ग्रामस्थांनी तिथं अतिशय सुंदर मंदिर उभारले आहे आणि तशी चांदीची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.

काशीद आणि मुरुडच्या मध्ये असलेल्या नांदगाव येथे श्री सिद्धिविनायक मंदिरात अतिशय मांगल्यपूर्ण वातावरण अनुभवता येते.

केळशी प्रसिद्ध आहे श्री महालक्ष्मी मंदिरासाठी, परंतु इथं अतिशय सुरेख असं आशापूरक सिद्धिविनायक गणपतीचं पेशवेकालीन मंदिरही आहे.

रायगड जिल्ह्यातील चौल हे खूप प्राचीन ठिकाण. इथं असलेलं मुखरी गणेश मंदिर आवर्जून पाहायला हवं.

कोकणातील कदाचित सर्वात प्रसिद्ध असलेलं गणेशमंदिर म्हणजे गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं बाप्पाचं मंदिर.

पावसहून पूर्णगडाच्या दिशेने जात असताना उजवीकडे एक फाटा समुद्रकिनारी असलेल्या गणेशगुळे गावात घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गणपतीचे मंदिर लागते. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिकाही इथं सांगितली जाते. कोकणातील अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांची भ्रमंती आमच्या या दर्याफिरस्ती ब्लॉगद्वारे तुम्ही करू शकता. तेव्हा नेहमी इथं या ही अगत्याची विनंती. आपल्या मित्रांना, कोकणवेड्या भटक्यांनाही दर्याफिरस्तीबद्दल आवर्जून सांगा बरं का!
उफराटा गणपती

गणपती म्हणजे विघ्नहर्ता. भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैचित्रपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच कहाणी आहे. गुहागरचा सागरतीर शांत, नीरव.. पाण्यात डुंबण्यासाठी तसा सुरक्षित मानला गेलेला. पण कोणे एके काळी, कदाचित ५०० वर्षांपूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर ग्राम गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून पश्चिमेला समुद्राकडे केलं आणि तेव्हा कुठं सागराचे थैमान संपले अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला म्हणून उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात श्रीधराने गुहागर वसवले तेव्हापासून ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे अशी नोंद आहे.
कोकणातील अद्भुत ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा.
संदर्भ – विश्वनाथ महादेव पित्रे – व्याडेश्वर माहात्म्य
श्री वेळणेश्वर देवस्थान

ही ब्लॉग पोस्ट श्री विजय पुराणिक आणि अमृता रास्ते यांच्याद्वारे प्रायोजित आहे. दर्या फिरस्तीच्या उपक्रमाला अशा अनेक कोकणवेड्या रसिकांचा हातभार लागल्याने हा प्रकल्प शक्य झाला.
अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच. गुहागरकडून दक्षिणेला तवसाळमार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात. घाट वाटेने गाडी समुद्रसपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला लागते. आणि मग अचानकपणे एखादं शिव मंदिर आपल्यासमोर येतं.

कोकणातील अनेक मंदिरे पेशवेकालीन आहेत. बहुतेक मंदिरे अठराव्या-एकोणिसाव्या शतकात बांधलेली असून त्यांची स्वतःची एक स्थापत्यशैली आहे असे म्हणता येईल. वेळणेश्वर हे गाव गोखले, रास्ते, गोवंडे, वेलणकर, घाग या मंडळींचे मूळ गाव मानले जाते. गॅझेटमध्ये दुर्दैवाने वेळणेश्वर बद्दल अगदीच त्रोटक माहिती आहे. पण १८७२ सालची मजेशीर नोंद अशी की इथली लोकसंख्या दीड हजार होती आणि महाशिवरात्रीच्या मेळ्यात इथं सुमारे १२ हजार रुपयांची विक्री होत असे.

श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ दोन हजार वर्षे जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथं श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरु ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे.

श्री वेळणेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून तीन दिवस चालतो. इथं लघुरुद्र, अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात. इथं असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे.

कोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. इथेही त्या आवर्जून पाहाव्यात अशाच सुंदर आहेत. पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या कमानीही नक्की पाहाव्यात.
श्री वेळणेश्वर हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे – चापेकर, चाफेकर, आचार्य, कातरणे, गोखले, बडे, बर्ये, लेले, रास्ते, वेलणकर (काश्यप गोत्रातील), वेलवडकर, व्यास, पाळंदे, अधिटकर, थोरात, देसाई, पलुसकर, पाऊलबुद्धे, पुराणिक (गार्ग्य गोत्रातील), मरुकर, मुरुगकर, वैद्य, म्हसकर, शास्त्री, सुतारे, गोवंडे, भातखंडे (काही भातखंडे श्री व्याडेश्वर कुलदैवत मानतात) सावरकर या कुटुंबांमध्ये कुलदैवत म्हणून श्री वेळणेश्वराची पूजा केली जाते.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अतिशय मोहक असा अनुभव घेण्यासाठी नक्की किनाऱ्यावर जायला हवं. इथला किनारा धोकादायक आहे असं काही जण म्हणतात. पाण्यात जलक्रीडा करत असताना आवश्यक ती खबरदारी मात्र घ्यायला हवी. नाहीतर चूक आपली आणि दोष मात्र निसर्गाचा असा प्रकार होतो.
संदर्भ –
१) कुलदैवत – अजित पटवर्धन
२) रत्नागिरी गॅझेट १८८३
३) साद सागराची मालिका – पराग पिंपळे, बुकमार्क प्रकाशन
कोळिसरेचा लक्ष्मीकेशव

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड जवळ चाफे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कोळिसरे येथे जाणारा मार्ग डाव्या बाजूला आहे. तिथून जवळपास ४ किमी अंतर नदीच्या दिशेने पुढे गेले की कोळिसरे गाव लागते. त्याच उतारावरून पायऱ्या उतरून लक्ष्मीकेशव मंदिराच्या आवारात आपण जाऊन पोहोचतो.
इथली उत्कृष्ट कोरीवकाम केलेली गंडकी शिळेची विष्णुमूर्ती म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत अविष्कार असं म्हणायला हरकत नाही. मूर्तीच्या डाव्या बाजूला देवी श्री लक्ष्मी आणि उजवीकडे गरुड मूर्ती कोरलेली आहे. दोहोंच्या बाजूला जय आणि विजय हे द्वारपाल कोरलेले आहेत. पद्म, शंख, चक्र आणि गदा या क्रमाने आयुधे धारण केलेलं हे विष्णूचे रूप केशवाचे रूप ठरते. साधारणतः ही मूर्ती ८०० वर्षे जुनी आहे. याच काळातील विष्णू मूर्ती दापोलीजवळ सडवे, टाळूसरे, पंचनदी आणि शेडवई अशा ठिकाणी आढळतात. मूर्तीचे संपूर्ण पाषाणरूप पाहायचे असेल तर सकाळी सात-साडेसातला जायचे. पूजेआधी हे पाहणे शक्य होते.

इथेच श्री रत्नेश्वर महादेवाचे मंदिर असून मागे एक हनुमान मंदिर आणि झरा सुद्धा आहे. शास्त्री नदीच्या परिसरातील अतिशय रम्य अनुभव मनाला शांतता देणारा असतो.

या पाच फूट उंच मूर्तीची कथा अशी की मालखेड येथील राष्ट्रकूट घराण्याच्या काळात ही रचना झाली. पुढे इस्लामी शासनाच्या काळात या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी ती रंकाळा तलावात बुडवण्यात आली. वरवडे गावातील काणे-जोशी-विचारे घराण्यातील तीन पुरुषांना दृष्टांत झाला आणि त्यांनी कोल्हापूरच्या रंकाळा तलावातून ही मूर्ती काढली. देवरुख संगमेश्वर मार्गे ही पेटी कोळिसरे येथवर आली आणि जड झाली. रात्रीच्या आरामानंतर मजुरांना ही पेटी हलवणे अशक्य झाले. इथले ग्रामस्थ भानू प्रभू तेरेदेसाई यांना देवास इथेच राहावयाचे आहे असा दृष्टांत झाला. इसवीसन १५१०च्या आसपास इथं लक्ष्मीकेशव मंदिराची स्थापना झाली. केसराज या नावाने सुद्धा हे दैवत बघून समाजात प्रसिद्ध आहे.

हे देवस्थान अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. काश्यप गोत्रातील – काशीकर, ठोसर, पंडित, पुराणिक, फडतरे, फडणीस, फाळके, बिनीवाले, बेंद्रे, भट, बेंद्रे, भेंडे, महाजन, माखलकर, मेहळकर, मेढेकर, राणे, लेणे, वेंगुर्लेकर, शिवणेकर, सुंकले, सुनाके. वसिष्ठ गोत्रातील – कुटुंबे, दांडेकर, वाटवे. विष्णुवृद्ध गोत्रातील – करवीर, मेहेंदळे, नेने. शांडिल्य गोत्रातील – उत्तूरकर, काणे, कानडे, केम्पवाडकर, घनवटकर, घुले, घोरपडे, जोशी, टकले, तुळपुळे, दणगे, पावसकर, पोतनीस, फडणीस, बावडेकर, बेहेरे, बोरगावकर, भाटे, मेघश्याम, मेडदकर, राजवाडे, राशिनकर, लकडे, लावेकर, विद्वांस, सारवरे, सुभेदार, सुरनीस, हरिश्चंद्रकर, हवालदार, हुपरीकर
रत्नागिरी जिल्ह्यातील विष्णुमूर्ती
तुरंबवची शारदादेवी
कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे जवळ मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव नावाच्या ठिकाणी शारदा देवीचे राजस्थानी पद्धतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराची जागा सर्व बाजूंनी वनराई आणि डोंगर असलेल्या ओंजळीमध्ये आहे इथला नवरात्र उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.

संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवसांची यात्रा येथे असते देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य भजन असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात गौराईचा नवस इथं तिसऱ्या दिवशी सुरू होतो त्यामध्ये दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात.

मंदिरात शारदा देवी सह मानाई देवी वरदायिनी देवी आणि चंडिका देवीच्या ही मूर्ती आहेत इथल्या परंपरेनुसार स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे दैनंदिन पूजा आर्चीचा मान आहे तिथे रोज सांज आरती केली जाते. अशी मान्यता आहे की हे कोकणातील सरस्वती किंवा शारदादेवीचे एकमेव मंदिर आहे. परंतु मी हल्लीच हिंदळे आणि मोरवेच्या मध्ये एक छोटेसे सरस्वती मंदिर पाहिले.

देवगड तालुक्यात हिंदळे जवळ तावडेवाडी नावाचं गाव मोरवे च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात लागतात तिथं हे 1951 सालात स्थापन केलेलं मंदिर मला दिसलं दुर्दैवाने दुपारची वेळ असल्याने आणि मंदिराला कुलूप असल्याने अधिक माहिती मिळाली नाही. देवी शारदेची कोकणातील अजून काही मंदिरे जर तुम्हाला ठाऊक असतील तर दर्या फिरस्तीला नक्की कळवा. कोकणातील दृश्य संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करणे हा आमचा हेतू असून तुमच्या मदतीने हा संकल्प नक्की सिद्धीस जाईल.





















































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.