Friday, July 3, 2026

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : स्वप्नातील प्रवासाची आखणी

 

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : स्वप्नातील प्रवासाची आखणी

२०१८ साली आम्ही काश्मीर ट्रिप करून आलो आणि त्यानंतर ठरवल होत की ह्या पुढची सहल नवीन जागी जाउ म्हणुन. तसे आम्ही दरवर्षी वैष्णोदेवी यात्रा करतोच आणि सोबत एखादी नवीन जागा फिरुन येतो. . नवीन ठिकाणे शोधणे, त्यांची माहिती वाचणे, प्रवासाचे व्हिडिओ पाहणे आणि पुढच्या सहलींची स्वप्ने रंगवणे हा आमच्या आयुष्याचा एक भागच बनला होता. एखाद्या ठिकाणाचा सुंदर फोटो किंवा व्हिडिओ दिसला की तिथे कधी जायचे याचे विचार मनात सुरू व्हायचे.

कुठे जायच असा विचार करत असताना २०१९ चा  सप्टेंबर महिना आला. जानेवारी २०२० मध्ये कुठेतरी मोठी सहल करायची असे आम्ही ठरवले. दिवाळी, ख्रिसमस किंवा शाळांच्या सुट्ट्यांमध्ये सर्व पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दी टाळून निवांतपणे प्रवासाचा आनंद घ्यावा म्हणून आम्ही जानेवारी महिन्याची निवड केली.

या प्रवासासाठी आमच्या घरातून मी, आई आणि माझी बहीण तयार होतो. माझी मैत्रीण स्नेहा व निलिमा,  निलिमाचा भाचा आणि माझा मित्र समीरही आमच्यासोबत येणार होते. समीर आमच्या काश्मीर ट्रिपलाही सोबत होता. अशा प्रकारे आम्ही एकूण सात जणांचा छोटासा पण उत्साही ग्रुप तयार झाला.

सुरुवातीला हरिद्वार, ऋषिकेश आणि अमृतसर एवढाच विचार होता. मात्र मी, आई आणि माझी बहीण या आधी हि अमृतसर जाऊन आलो होतो. तर माझ्या बहिणीने सांगितले की आपण त्यापेक्षा जैसलमेर जाऊ.  पण हा अगदी वेगळा रुट होत होता. मग गुगलवर शोधमोहीम सुरू झाली. अनेक प्रवासवर्णने, ब्लॉग, यूट्यूब व्हिडिओ आणि पर्यटन संकेतस्थळे पाहिली. प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती गोळा केली. हळूहळू आमचा प्रवास आकार घेऊ लागला आणि अखेर मुंबई- हरिद्वार – ऋषिकेश – कटरा – अमृतसर – जैसलमेर – जोधपूर – मुंबई असा तब्बल १३ दिवसांचा प्रवास निश्चित झाला.
पुर्ण प्लन मग सर्वाना ईमेल केला. सर्वांना तो आवडला ही.

प्रवास ठरवणे जितके सोपे वाटते तितके प्रत्यक्षात नसते. सात जणांच्या वेळा, सुट्ट्या, बजेट आणि प्रवासाचे पर्याय यांचा विचार करावा लागतो. पण त्या नियोजनातही एक वेगळी मजा असते. प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक नवीन माहिती आम्हाला प्रवासाच्या आणखी जवळ नेत होती.

यानंतर सुरू झाले रेल्वे तिकिटांचे नियोजन. आजकाल सर्व बुकिंग ऑनलाइन होत असल्याने काम थोडे सोपे झाले असले तरी सात जणांचे संपूर्ण प्रवासाचे आरक्षण करणे हे मोठे आव्हान होते. रेल्वेचे आरक्षण चार महिन्यांपूर्वी उघडते, त्यामुळे योग्य दिवशी आणि योग्य वेळी बुकिंग करणे आवश्यक होते.
अनेक वेळा रेल्वेचे वेळापत्रक तपासले, जोडणाऱ्या गाड्या पाहिल्या आणि मग अंतिम निर्णय घेतला.

आमच्या प्रवासातील रेल्वे मार्ग पुढीलप्रमाणे ठरला –

• मुंबई ते हरिद्वार – LTT HWH Superfast
• हरिद्वार ते कटरा – Hemkunt Express
• जम्मू ते जोधपूर – JAT ADI Express
• जोधपूर ते जैसलमेर – बस प्रवास
• जैसलमेर ते जोधपूर – JSM JU Express
• जोधपूर ते मुंबई – Ranakpur Express

रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर हॉटेल्स आणि स्थानिक वाहतुकीची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे तपासली. Make My Trip, Booking.com, Yatra अशा विविध प्लॅटफॉर्मवर दर आणि सुविधा यांची तुलना केली. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, स्थान, पुनरावलोकने आणि किंमत यांचा बारकाईने अभ्यास केला.

हरिद्वारसाठी युपी गव्हर्मेंट च्या साईट वरुन त्यांच खासगी घाट असलेल अलकनंदा हे होटेल बुक केल.. कटरा आम्ही 7 व्यांदा जात होतो त्यामुळे आमच नेहमीच हॉटेल श्रीधर बुक केल. हरिद्वार वरुन ऋषिकेश  जाण्यासाठी गाडी गुगल वरुन शोधलेल्या India Easy Trip (P) Ltd मधुन बुक केली. जैसलमेरसाठी मात्र विशेष उत्सुकता होती. तिथे  पृथ्वी पॅलेस नावाचे एका हवेलीचे  हॉटेल मधे रुपांतर केलेले हॉटेल बुक केले.जैसलमेर मधे ऊँटाची सफारी Sam Dunes नावाच्या साइट वरून बुक केली.अनेक पुनरावलोकने वाचल्यानंतर योग्य कॅम्पची निवड केली. उंट सफारी, लोकनृत्य, राजस्थानी जेवण याची कल्पना मनातच आनंद निर्माण करत होती.जोधपुर मधे ओम हेरिटेज हॉटेल बुक केले.
हळूहळू सर्व बुकिंग पूर्ण झाली आणि आता प्रवासाची प्रत्यक्ष तयारी सुरू झाली. डिसेंबर महिना सुरू होताच शॉपिंगची लगबग सुरू झाली. राजस्थानमधील थंडी, हरिद्वारमधील सकाळचे वातावरण आणि प्रवासाचा कालावधी लक्षात घेऊन आवश्यक वस्तूंची यादी तयार केली.

दिवस जसजसे जवळ येत होते तसतसा उत्साह वाढत होता. अखेर २० जानेवारीची वाट पाहणे सुरू झाले. अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर आता स्वप्नातील प्रवास प्रत्यक्षात साकार होणार होता.



हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर  : प्रवासाची सुरुवात आणि अनपेक्षित गोंधळ

१९ जानेवारी, रविवार.
उद्याच निघायचे असल्याने घरात सर्वजण तयारीत व्यस्त होते. प्रवासात बाहेरचे अन्न नेहमीच मिळेल, तरी उदया ट्रेन मधे खाण्यासाठी नेण्याच्या पदार्थांची तयारी सुरू होती. चिवडा, ठेपले, भरलेली कारली, चटणी, बिस्किटे, फळे, मिठाई आणि इतर खाऊच्या वस्तूंनी बॅगा भरू लागल्या.

संध्याकाळी सर्व सामानाची पुन्हा एकदा तपासणी केली. तिकिटे, ओळखपत्रे, हॉटेल बुकिंगचे प्रिंटआउट, औषधे आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर अखेर उद्याचा दिवस उजाडणार होता आणि आमचा बहुप्रतीक्षित हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर प्रवास सुरू होणार होता.

20 जानेवारी - सोमवार
मंमी सकाळी सर्वात आधी 4 वाजता उठली. तिला चिंचेचा  भात बनवायचा होता. चहा वगेरे बनवून मग तिने आंघोळ उरकली. मग आम्हाला उठवले .आम्ही ही सर्व आवरून 6:30 पर्यंत रेडी झालो. समीर आणि स्नेहा आम्हाला डायरेक्ट LTT ला भेटणार होते. त्याचप्रमाणे निलीमा व रोहन सुद्धा आम्हाला LTT ला भेटणार होते

मी, मंमी , बहीण आणि पप्पा आम्ही सर्व सामान टॅक्सीत टाकून  निघालो. 7:50 ची रेल्वे सुटणार होती.आम्ही 7:15 ला LTT पोहोचलो. समीर आणि स्नेहा सुद्धा आमच्या आधी आले होते. पण निलीमा आणि रोहन यांचा काही पत्ता नव्हता.

7:30 झाले तरी आलेत नाही. मग रोहनला फोन लावला तर आम्ही निघतोय असे म्हणाले. माझा जीव धाकधुक करु लागला  कारण 20 मिनिटांत गाडी सुटणार होती आणि त्यांना विलेपार्ले वरुन यायला अर्धा तास तरी लागला असता.

आम्ही गाडीत सामान ठेऊन त्यांची वाट पाहत होतो. सतत फोन  करत होतो. शेवटी ते न येताच गाडी सुट्ली.गाडीने स्टेशन सोडताच त्यांचा फोन आला की ते लोक पोहोचले पण मग गाडी थांबणार नव्हती.

गाडीचा पुढचा स्टॉप कल्याण होता जो 8:30 ला येणार होता आणि एवढ्या वेळात ते कल्याण पोहोचणे शक्य होणार नव्हते.

आम्हालाही काही सुचत नव्हते.आता हे लोक दुस-या दिवशी हरिद्वार कसे पोहोचतील याचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांना स्टेशन बाहेर एक टॅक्सीवाला भेटला जो त्यांना बोलला की इगतपुरी स्टेशनवरून गाडी पकडून देईल. दुसरा काहीच उपाय नव्हता. त्यांनी हे मान्य केले आणि टॅक्सीने निघाले. इकडे आमच्याही जीवाची घालमेल होत होती. सतत आम्ही यांच्या संपर्कात होतो. गाडीच्या स्टॉप लिस्टमध्ये इगतपुरी स्टेशन नव्हते. त्यामुळे मला जास्तच धाकधूक होती. 

त्या वेळी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की एक्सप्रेस गाडी इगतपुरी येथे अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी थांबणार आहे. आमच्या मनात काळजीच होती.10 वाजले आणि इगतपुरी  स्टेशन आले मी लगेच निलीमाला कॉल केला. तेव्हा ते लोक म्हणाले आम्ही स्टेशनवरच आहोत.त्या टॅक्सी चालकाच्या चपळाईमुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे ते दोघेही सुखरूपपणे आमच्यात सामील झाले. मात्र या संपूर्ण गोंधळाची किंमत निलीमाला मोजावी लागली. टॅक्सीचे अतिरिक्त भाडे आणि इतर खर्च मिळून तिला जवळपास ₹8,000 जास्त खर्च करावे लागले.

यामुळे आम्हाला एक महत्त्वाचा धडा मिळाला – प्रवासाला निघताना नेहमी वेळेच्या आधीच स्टेशनवर पोहोचले पाहिजे. शेवटी सर्व अडचणींवर मात करून आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

आमचा संपूर्ण दिवस ट्रेनमधूनच जाणार होता. दुपारी घरून आणलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत सर्वांनी जेवण केले. सकाळपासूनची धावपळ आणि तणाव यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली. खिडकीबाहेर वेगाने मागे सरकणारी गावे, शेते आणि निसर्गरम्य दृश्ये पाहण्यात वेळ कसा गेला ते समजलेच नाही.

संध्याकाळी चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही विविध खेळ खेळत गप्पांचा फड रंगवला. हशा, मस्करी आणि जुन्या आठवणींमुळे प्रवास आणखी आनंददायी झाला. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले आणि सुमारे दहा वाजता आपापल्या बर्थवर जाऊन विसावलो.

दिवसाची सुरुवात गडबड, धावपळ आणि काळजीने झाली असली तरी शेवट मात्र समाधानकारक झाला होता. ट्रेनच्या हलक्या डुलक्यांमध्ये कधी गाढ झोप लागली ते कळलेच नाही. उद्याच्या नव्या ठिकाणांच्या उत्सुकतेने मन भरून गेले होते.

2१ जानेवारी - मंगळवार
आज सकाळी ८ वाजता जाग आली. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरलेले दिसत होते. त्यातच कळले की आमची गाडी तब्बल दोन तास उशिराने धावत आहे आणि आम्ही अजून दिल्लीदेखील पार केली नव्हती.

जानेवारीचा महिना असल्याने संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला होता. दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता आणि त्यामुळे गाडीला वेळेवर पोहोचणे आता शक्य नव्हते. नियोजनानुसार गाडी हरिद्वारला दुपारी १.३० वाजता पोहोचणार होती. आम्ही मनात हिशोब केला की जरी ३ वाजेपर्यंत पोहोचलो तरी हॉटेलमध्ये जाऊन आंघोळ उरकून संध्याकाळची गंगा आरती पाहता येईल.

पण बहुधा त्या दिवशी गंगा आरती आमच्या नशिबात नव्हती. गाडीचा उशीर वाढतच गेला आणि अखेर आम्ही संध्याकाळी सुमारे ५.१५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान हरिद्वारमध्ये दाखल झालो.

लगेच स्टेशनबाहेर येऊन आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी दोन रिक्षा केल्या. आजचे आमचे मुक्कामाचे ठिकाण होते उत्तर प्रदेश पर्यटन महामंडळाचे अलकनंदा हॉटेल. हॉटेलवरील सर्व सोपस्कार आटपून आम्ही खोल्यांमध्ये आलो. खोल्या साध्या असल्या तरी स्वच्छ, प्रशस्त आणि आरामदायी होत्या.

अलकनंदा हॉटेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्थान. हे हॉटेल गंगा नदीच्या घाटाजवळ वसलेले आहे. हॉटेलच्या मागील बाजूलाच त्यांचा खासगी घाट असून तेथे मुक्कामाला येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामात गंगास्नान करता येते. त्यामुळे गंगेच्या पवित्र प्रवाहाचा अनुभव अगदी जवळून घेण्याची एक वेगळीच संधी मिळते.

प्रवासाचा थकवा असला तरी गंगेच्या सान्निध्यात आल्यामुळे मन प्रसन्न झाले होते आणि हरिद्वारमध्ये आल्याची खरी अनुभूती याच क्षणी मिळाली.

सायंकाळचे ६ वाजले होते आणि गंगा आरती ७ वाजता सुरू होणार होती. गंगा आरती होण्याचे ठिकाण हर की पौडी आमच्या हॉटेलपासून बरेच लांब होते आणि आमच्या सर्वांची अंघोळ होईपर्यंत बराच वेळ जाणार होता. आता आपल्याला आरती पाहता येणार नाही हे आम्हाला कळून चुकले. मग आम्ही हॉटेलमागे असलेल्या स्नानघाटावर स्नान करण्यासाठी गेलो.

 

हॉटेलच्या मागे असलेले गंगा घाट

 

तेथील दृश्य अत्यंत मनमोहक होते. आयुष्यात पहिल्यांदाच गंगा नदी प्रत्यक्ष पाहत होते. ज्या पद्धतीने तिचे वर्णन ऐकले होते, तशीच ती आपल्या अल्लड स्वभावात शांतपणे वाहत होती. पाणी अतिशय गार होते आणि थंडीही चांगलीच जाणवत होती. तरी आम्ही तिथे तांब्याने थोडे पाणी अंगावर घेतले आणि नंतर खोल्यांमध्ये जाऊन स्नान उरकले.

त्यानंतर हर की पौडी पाहण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सर्वत्र निरव शांतता आणि अंधार पसरलेला होता. आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन ऑटोरिक्षा शोधू लागलो. थोड्या वेळाने एक रिक्षा मिळाली आणि आम्ही लगेच हर की पौडीकडे रवाना झालो.

गंगा आरती होऊन गेल्यामुळे तिथेही बरीच शांतता होती. घाटाजवळ फुले आणि दिवा घेऊन गंगापूजन करता येते. त्याप्रमाणे आम्ही फुले घेतली. आम्ही पूजा करणारच होतो, इतक्यात काही जण स्वतःला पंडित म्हणवत आमच्याकडे आले. त्यांनी दोन मिनिटे काही मंत्र म्हटले आणि फुले व दिवा नदीच्या प्रवाहात सोडायला सांगितले. त्यानंतर आमच्या प्रत्येकाकडून १०० रुपये घेतले.

 

जय गंगे माँ

त्या अनुभवातून आम्ही एक गोष्ट शिकलो. यापुढे कधी गंगामैयाच्या दर्शनाला आलो, तर फुले आणि दिवा घेऊन स्वतःच पूजा करायची. “जय गंगे माँ” म्हणत पूजा आटोपून आम्ही निघालो. तेवढ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जवळच्याच एका दुकानातून चना मसाला घेतला आणि खात खात फेरफटका मारला. त्यानंतर पाहण्यासारखे विशेष काही उरले नव्हते.

आम्हालाही हॉटेलवर जाऊन जेवण करून विश्रांती घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशला जाण्यासाठी गाडी येणार होती आणि तेथून पुढे जम्मूसाठी प्रस्थान करायचे होते.

त्यामुळे गंगा आरती पाहण्याची आमची इच्छा अधुरीच राहिली. आता पुन्हा कधी गंगामैयाचे बोलावणे येईल, तेव्हाच हा योग पुन्हा जुळून येणार होता.

हर की पौडीवरून निघून रिक्षाने आम्ही हॉटेलवर आलो. रूमवर जाऊन लगेच फ्रेश होऊन आम्ही हॉटेलच्या जेवणकक्षात पोहोचलो.

जेवण अतिशय स्वादिष्ट होते. डाळ फ्राय, भात, मशरूम मसाला, रोटी, पापड, सॅलड – सर्व काही गरमागरम वाढले जात होते. दिवसभरातील हेच आमचे पहिले व्यवस्थित जेवण असल्यामुळे सर्वांनी मनसोक्त ताव मारला.

जेवण झाल्यानंतर पुन्हा आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन, उद्याच्या ऋषिकेश भेटीची उत्सुकता आणि पुढील प्रवासाची स्वप्ने मनात रंगवत आम्ही निद्रेच्या अधीन झालो.

क्रमश: 

टीप : - खुप प्रयत्न करुन ही मला फोटोज टाकणे नाहि जमत आहे. मि सर्व प्रकारे लिंक टाकुन preview करुन पाहिल फोटोज  नाही दिसत आहेत.

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन

लेखकनयना माबदीयांनी रविवार, 05/07/2026 18:01 या दिवशी प्रकाशित केले.

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन 

२२ जानेवारी - बुधवार
सकाळी ८ वाजता गाडी येणार होती. त्यामुळे आम्ही पहाटेच ५:३० वाजता उठलो. सर्वांना फोन करून उठवण्याची जबाबदारी पार पाडली आणि सकाळची लगबग सुरू झाली. कालच बहुतेक सामान आवरून ठेवले असल्याने तयारी पटकन झाली. थंडगार सकाळ, प्रवासाची उत्सुकता आणि आजचा भरगच्च कार्यक्रम यामुळे सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. आम्ही सर्वजण ७:१५ पर्यंत तयार झालो.

त्यानंतर हॉटेलमधून गरमागरम चहा मागवला आणि घरून सोबत आणलेला नाश्ता करून दिवसाची सुरुवात केली. चहाच्या घोटांसोबत आजच्या प्रवासाची चर्चा रंगली. ठरल्याप्रमाणे बरोबर वेळेवर गाडी आली. आम्ही सर्व सामान घेऊन खाली आलो आणि बॅगा व्यवस्थित गाडीवर बांधून घेतल्या.

आजचा दिवस पूर्णपणे ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. दिवसभर हीच गाडी आमच्यासोबत राहणार होती आणि संध्याकाळी पुन्हा हरिद्वार रेल्वे स्थानकावर सोडणार होती. त्यामुळे दिवसाची कोणतीही घाई किंवा चिंता नव्हती. हॉटेलमधील उरलेला हिशोब चुकता करून, कर्मचाऱ्यांचा निरोप घेत आम्ही उत्साहाने ऋषिकेशकडे प्रस्थान केले. गंगेच्या कुशीत वसलेल्या आणि योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषिकेशच्या दर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.

वातावरण अतिशय आल्हाददायक होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आजच्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला होता. लक्ष्मण झुला, राम झुला, त्रिवेणी घाट आणि १३ मजली मंदिर अशी प्रमुख स्थळे पाहून संध्याकाळपर्यंत पुन्हा हरिद्वार स्टेशन गाठायचे होते. आमची पुढील यात्रा कटराकडे जाणाऱ्या हेमकुंड एक्स्प्रेसने होणार होती. ही गाडी मूळतः ऋषिकेशहून सुटत असली तरी त्या काळात काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ऋषिकेश रेल्वे स्थानक बंद होते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी आम्हाला पुन्हा हरिद्वारला परत यावे लागणार होते. दिवसाचा कार्यक्रम भरगच्च असला तरी प्रत्येक ठिकाण निवांतपणे पाहण्याचा आमचा प्रयत्न होता. गंगेच्या काठावरील निसर्गसौंदर्य, प्राचीन मंदिरे आणि ऋषिकेशचे आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.


ऋषिकेशला सर्वप्रथम गंगाकिनारी असलेल्या १७ मजली मंदिरात गेलो. हे मंदिर सीता राम धाम म्हणून ओळखले जाते. हे मंदिर १७ मजली असून येथे सुमारे १००० खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणी अनेक देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.. मंदिराच्या उंचीमुळे येथून गंगेचे पात्र अगदी विस्तीर्ण दिसत होते. आल्हाददायक दृश्य होते ते. मागे उंच डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य आणि स्फटिकासारखे चमकणारे गंगेचे पाणी यामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मंदिराच्या गच्चीवर उभे राहून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळताना मन प्रसन्न झाले. 

17 मंजिला मंदीरातुन दिसणारे द्रुश्य

 

शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दूर, अशा शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी राहणाऱ्यांचा खरोखरच हेवा वाटत होता. येथे काही काळ निवांत बसून त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढील स्थळांकडे मार्गस्थ झालो.

मंदिराचे दर्शन शांतपणे घेऊन झाल्यावर जवळच असलेल्या एका दुकानात रुद्राक्ष पाहण्यासाठी थांबलो. तेथे विविध प्रकारचे रुद्राक्ष मांडून ठेवले होते. दुकानदाराने एकमुखी, पंचमुखी तसेच इतर प्रकारच्या रुद्राक्षांची माहिती सांगितली. खरा रुद्राक्ष कसा ओळखावा, त्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसेच वेगवेगळ्या मुखांच्या रुद्राक्षांचे वैशिष्ट्य काय असते याविषयी बरीच रंजक माहिती मिळाली. काही वेळ ते सर्व पाहण्यात आणि जाणून घेण्यात गेला.

सकाळी फक्त हलकाच नाश्ता केला असल्याने आता पुन्हा भूक लागायला सुरुवात झाली होती. प्रवासात भूक लागली की गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी असते. तेवढ्यात जवळच तळलेल्या भजींचा खमंग सुगंध दरवळत होता. मग तिथेच असलेल्या भजीवाल्याकडे मोर्चा वळवला. गरमागरम भजी आणि वाफाळता चहा यांचा आस्वाद घेतला. त्या साध्या पण चविष्ट अल्पोपहाराने थकवा क्षणात दूर झाला. थोडी पोटपूजा झाल्यावर नव्या उत्साहाने आम्ही पुढील स्थळांकडे मार्गस्थ झालो..

गंगेच्या ह्या किनाऱ्यावरून दुसरीकडे जाण्यासाठी पूल आहेत. त्यात लक्ष्मण झुला व राम झुला हे दोन प्रसिद्ध झुलते पूल आहेत. असे मानले जाते की, वनवासाच्या काळात लक्ष्मणांनी याच परिसरात गंगा नदी ओलांडली होती. त्याच्या स्मरणार्थ येथे लक्ष्मण झुला उभारण्यात आला. तर राम झुला हा तुलनेने नवीन पूल असून तो स्वर्ग आश्रम आणि शिवानंद आश्रम यांना जोडतो. हे दोन्ही पूल ऋषिकेशची ओळख मानले जातात. 

 

लक्ष्मण झुला 

 

पुलावरून चालताना खाली वाहणारी गंगा, दोन्ही बाजूंनी दिसणारे डोंगर आणि आश्रम यांचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते. 

लक्ष्मण झुल्यावरुन दिसणारी गंगा नदी व तिच्या आसपासचा परिसर

 


आता आम्हाला लक्ष्मण झुला पार करून त्या बाजूला जायचं होतं आणि तिथली ठिकाणं पाहून पुन्हा राम झुला पार करून या बाजूला येऊन गाडीत बसायचं होतं. या पुलांवरून वाहनांना प्रवेश नसल्यामुळे संपूर्ण प्रवास पायीच करावा लागणार होता.

लक्ष्मण झुला पार करून त्याच्या जवळच असलेल्या १३ मजली मंदिरात गेलो.

१३ मजली मंदिर
 १३ मजली मंदिर

 

हे मंदिर कैलास निकेतन मंदिर म्हणून ओळखले जाते. अनेक मजल्यांवर विविध देवी-देवतांच्या मूर्ती इथेही स्थापित केलेल्या आहेत.या मंदिरात सर्व देवी-देवतांची मोठमोठी मंदिरे आहेत. जसजसे आपण वर जातो तसे तिथून गंगेचे रूप अधिकच विराट वाटत जाते. 

हिरवीगार दिसणारी गंगा व त्यावर असलेला लक्ष्मण झुला, आसपासचे डोंगर, झाडेझुडपे असा निसर्ग जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटला आहे असेच वाटते. 

१३ मंजिला मंदीरातुन दिसणारा लक्ष्मण झुला 

 

मंत्रमुग्ध होऊन पाहत राहावे असे वाटत होते, पण वेळेची कमतरता असल्याने तेथून पाय काढावा लागला.

इथून पुढे निघाल्यावर आम्ही भूतेश्वर महादेव मंदिरात गेलो. ऋषिकेशमधील हे एक प्राचीन आणि शांत शिवमंदिर आहे. मुख्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत येथे गर्दी कमी असल्याने मंदिर परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. स्थानिक भाविकांमध्ये या मंदिराबद्दल विशेष श्रद्धा असून भगवान शंकराचे हे एक जागृत स्थान मानले जाते.

मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणाची अनुभूती येते. सभोवताली असलेली झाडे, शांत परिसर आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण यामुळे मन एकदम शांत होते.
मग पुढे राम झुला गाठण्यासाठी तिथे टॅक्सीची सोय असल्याने ती करून आम्ही रामझुल्याजवळ आलो.

दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. माझ्या काही मित्रांनी ऋषिकेशमधील प्रसिद्ध "चोटीवाला" भोजनालयाबद्दल सांगितले होते. त्यामुळे ते शोधतच आम्ही तेथे पोहोचलो. हे भोजनालय केवळ चविष्ट जेवणासाठीच नव्हे, तर त्याच्या अनोख्या ओळखीमुळेही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. भोजनालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पारंपरिक वेशभूषेत, टक्कल आणि मागे छोटीशी शेंडी असलेला एक व्यक्ती बसलेला असतो. याच वैशिष्ट्यपूर्ण रूपावरून या भोजनालयाला "चोटीवाला" हे नाव मिळाले आहे.

 

चोटीवाला

आत जाऊन आम्ही रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. प्रवासामुळे लागलेली भूक आणि चविष्ट भोजन यामुळे जेवणाची मजा आणखीच वाढली. जेवण झाल्यावर त्या प्रसिद्ध चोटीवाल्यासोबत एक समूह छायाचित्रही काढून घेतले. ऋषिकेशला भेट दिल्याची ती एक सुंदर आठवण ठरली.


त्यानंतर आम्ही परमार्थ निकेतन पाहण्यासाठी निघालो. ऋषिकेशला जगाची "योगनगरी" किंवा "Yoga Capital of the World" म्हणून ओळखले जाते. येथे असंख्य योगाश्रम, ध्यानकेंद्रे आणि आध्यात्मिक संस्था आहेत. देश-विदेशातून हजारो साधक येथे योग आणि ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी येतात.

परमार्थ निकेतन हे ऋषिकेशमधील सर्वात प्रसिद्ध आश्रमांपैकी एक आहे.
 


आश्रमासमोरील गंगाघाट अतिशय सुंदर आणि शांत आहे. घाटाजवळ बांधलेल्या पुलावर भगवान शंकरांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते.
 

गंगेच्या मंद प्रवाहाकडे पाहत काही काळ आम्ही तेथे निवांत बसलो. सभोवतालचे शांत वातावरण, वाहणारी गंगा आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे मन प्रसन्न झाले. येथूनच आम्ही घरी नेण्यासाठी गंगेचे पवित्र जल भरून घेतले आणि त्या पवित्र भूमीची आठवण कायम सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला.

थोडा वेळ परमार्थ निकेतन परिसरात घालवून आम्ही निघालो. आता आम्ही रामझुल्याजवळ आलो होतो. गंगेवर बांधलेला हा झुलता पूल ऋषिकेशमधील एक प्रमुख आकर्षण आहे. 

राम झुला 

 

स्वर्ग आश्रम आणि शिवानंद आश्रम यांना जोडणारा हा पूल लक्ष्मण झुल्याप्रमाणेच पर्यटक आणि भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. पुलावरून चालताना एका बाजूला वाहणारी गंगा, दोन्ही बाजूंना उभे असलेले डोंगर आणि नदीकिनारी वसलेले आश्रम यांचे दृश्य मन मोहून टाकणारे होते. पुलावरून वाहणारा थंडगार वारा आणि समोर दिसणारे निसर्गसौंदर्य अनुभवत आम्ही सावकाश रामझुला पार केला.

आता हा पार करून आम्ही पुन्हा या किनाऱ्यावर येणार होतो. रामझुला पार केल्यानंतर गाडीच्या चालकाला फोन करून बोलावून घेतले आणि पुढील प्रवास सुरू केला. आता आमचे शेवटचे ठिकाण राहिले होते – त्रिवेणी घाट.

त्रिवेणी घाटावरही दररोज भव्य गंगा आरती होते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम येथे असल्याची श्रद्धा असल्यामुळे या घाटाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र आरती संध्याकाळी ७ वाजता सुरू होत होती आणि आम्हाला ५ वाजेपर्यंत स्टेशन गाठायचे होते. त्यामुळे इथेही आरती पाहता येणार नव्हती. 

त्रिवेणी घाट येथे होणारी गंगा आरती - जालावरुन साभार 


योगनगरी मधे येउन आपण का म्हणुन मागे राहावे, त्यामुळे त्रिवेणी घाटावर थोडा योगा अभ्यास केला.

 

थोडा वेळ घाटावर थांबून, गंगेच्या शांत प्रवाहाचे दर्शन घेत आणि काही सुंदर छायाचित्रे काढून आम्ही हरिद्वारकडे निघालो.

आजचा दिवस अतिशय सुंदर आणि संस्मरणीय गेला. गंगेचे सान्निध्य, ऋषिकेशचे आध्यात्मिक वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये मनात कायमची कोरली गेली. परतीच्या प्रवासात गाडीत बसताच थंडगार वाऱ्यामुळे आम्ही डुलक्या घेऊ लागलो. दिवसातील सर्व अनुभव मनात पुन्हा पुन्हा उलगडत असतानाच पाहता पाहता सायंकाळी ५:१५ वाजता आम्ही हरिद्वारला पोहोचलो.

हरिद्वार स्टेशनवर पोहोचलो तेव्हा आमची ट्रेन हेमकुंड एक्स्प्रेस आधीच प्लॅटफॉर्मवर लागलेली होती. मागील दिवशीचा अनुभव ताजा असल्याने पुन्हा कोणतीही गडबड होऊ नये याची सर्वांनाच काळजी वाटत होती. त्यामुळे वेळ न दवडता आम्ही सर्व सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर गेलो आणि लगेच डब्यात जाऊन आपापल्या जागा पकडल्या. सीटवर निवांत बसल्यावरच जीवात जीव आला. गाडी सुटायला अजून जवळपास अर्धा तास अवकाश होता, पण वेळेआधी ट्रेनमध्ये बसल्यामुळे मन पूर्णपणे निर्धास्त झाले.

खिडकीतून बाहेर पाहताना गेल्या दोन दिवसांच्या आठवणी मनात तरळू लागल्या. गंगेचे पवित्र दर्शन, ऋषिकेशचे निसर्गसौंदर्य, लक्ष्मण झुला, राम झुला, मंदिरे, आश्रम आणि घाट यांचे अनुभव अजूनही डोळ्यांसमोर तरळत होते. इतके सर्व पाहूनही एक छोटीशी खंत मात्र मनात राहिली ती म्हणजे गंगा आरती प्रत्यक्ष पाहता आली नाही. हरिद्वार आणि ऋषिकेशच्या प्रवासातील तो एक अविस्मरणीय अनुभव राहून गेला होता.

अखेर शिट्टी वाजली आणि ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्म सोडू लागली. खिडकीतून दूर जात असलेल्या हरिद्वारकडे पाहताना मन नकळत भावूक झाले. अवघे दोन दिवस त्या पवित्र भूमीत घालवले होते, पण गंगेचे सान्निध्य, तेथील शांतता आणि अध्यात्मिक वातावरण मनाला विलक्षण समाधान देऊन गेले होते. पुन्हा कधीतरी गंगेच्या कुशीत काही दिवस निवांत घालवण्यासाठी नक्की यायचे, असा निश्चय मनाशी करत आम्ही जड अंतःकरणाने हरिद्वारचा निरोप घेतला.

॥ जय गंगा मैया ॥

क्रमश: 


हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : कटरा आगमन व पटनीटॉप

लेखकनयना माबदीयांनी बुधवार, 29/07/2026 22:08 या दिवशी प्रकाशित केले.

२३ जानेवारी – गुरुवार – कटरा आगमन

आज पहाटे सुमारे ५:३० वाजता आमची गाडी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली. गाडीतून उतरून सर्व सामानासह आम्ही स्टेशनवर आलो. बाहेर पडताच कडाक्याच्या थंडीची जाणीव झाली. संपूर्ण प्रवास वातानुकूलित डब्यातून झाल्यामुळे बाहेरचे वास्तविक तापमान किती कमी आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, जॅकेट, मफलर आणि टोपी घालून आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो.

स्टेशनसमोरच उभे असलेले त्रिकुट पर्वत पाहून मन आनंदाने भरून गेले. पर्वतांच्या कुशीत वसलेले कटरा शहर आणि भवन कडे जाणाऱ्या मार्गावरील असंख्य दिव्यांची लखलखती रोषणाई अतिशय मनमोहक दिसत होती.

त्या प्रसन्न वातावरणाने प्रवासाचा सारा थकवा क्षणात दूर झाला. आम्ही यापूर्वीही अनेक वेळा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि ही आमची सातवी यात्रा होती. प्रत्येक वेळी येथे आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद, शांतता आणि समाधान लाभते. या पवित्र भूमीत एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी भाविकांना पुन्हा पुन्हा येथे येण्यास भाग पाडते.

स्टेशनच्या बाहेर आल्यावर हॉटेलने पाठविलेली व्हॅन आम्हाला घेण्यासाठी आली होती. तिच्यामधून आम्ही थेट आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. हॉटेल श्रीधर निवास हे आमचे नेहमीचे आणि आवडीचे हॉटेल आहे. जरी ते पंचतारांकित हॉटेल नसले तरी स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि उत्तम सेवा यामुळे ते आम्हाला नेहमीच आपलेसे वाटते. हॉटेलमधील कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशीही अनेक वर्षांची ओळख झाल्याने येथे आल्यावर घरच्यासारखे वातावरण जाणवते.

रूममध्ये जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली, अंघोळ करून फ्रेश झालो आणि गरमागरम चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला. आजचा दिवस पर्यटनासाठी राखून ठेवला होता. आमच्या कार्यक्रमानुसार पटनीटॉप हिल स्टेशन पाहण्यासाठी जाण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉटेलमध्ये आधीच गाडीची व्यवस्था करून ठेवली होती. सर्वजण वेळेत तयार झाले आणि सकाळी बरोबर ८ वाजता आम्ही जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या पटनीटॉपच्या दिशेने आनंदाने प्रस्थान केले.

पटनीटॉप

पटनीटॉप हे कटऱ्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २०२४ मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण दूरवर पसरलेल्या हिरव्यागार कुरणांमुळे, दाट पाईन व देवदार वृक्षांच्या वनराईमुळे आणि मन मोहून टाकणाऱ्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची विशेष गर्दी असते. आमच्यापैकी अनेकांना बर्फात खेळण्याची आणि हिमाच्छादित प्रदेश अनुभवण्याची खूप उत्सुकता होती.-

आमच्या ग्रुपमधील तीन जणांनी यापूर्वी कधीही बर्फवृष्टी पाहिली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष बर्फाच्छादित डोंगर आणि शुभ्र बर्फाचा पसारा पाहण्यासाठी ते खूपच आतुर आणि उत्सुक होते. कटऱ्यातून पर्टनीटॉपकडे जाणारा प्रवासही तितकाच रम्य होता. वळणावळणाच्या डोंगररस्त्यांवरून आमची गाडी हळूहळू पुढे सरकत होती. दोन्ही बाजूंनी उंचच उंच पर्वतरांगा, दाट वृक्षराजी आणि निसर्गाची मुक्त उधळण पाहताना डोळे भरून येत होते. निसर्गाचे ते अप्रतिम रूप पाहून असे वाटत होते की दोन डोळ्यांत हे सारे सौंदर्य किती साठवावे!

 

सुमारे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका छोट्याशा ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबलो. या भागात मॅगी, पराठे, चहा यांसारखे पदार्थच प्रामुख्याने मिळतात. थंड वातावरणात गरमागरम मॅगी आणि पराठ्यांचा आस्वाद घेताना वेगळीच मजा आली. गरम चहामुळे अंगात पुन्हा उत्साह संचारला आणि पुढील प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो.

याच ठिकाणी पुढे बर्फात खेळण्यासाठी आवश्यक असलेले बूट आणि जॅकेट्स भाड्याने मिळत होते. आमच्याकडे उबदार जॅकेट्स आधीच असल्यामुळे आम्ही फक्त बर्फावर चालण्यासाठी विशेष बूट घेतले आणि पुन्हा पर्टनीटॉपच्या दिशेने मार्गस्थ झालो.

अजून सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पर्टनीटॉप येथे पोहोचलो. त्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आमच्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी उभी करून आम्हाला पुढे पायी जाण्यास सांगितले आणि परत येताना त्याच ठिकाणी येऊन फोन करण्यास सांगितले.

आम्ही सर्वजण उत्साहाने पुढे चालू लागलो. चारही बाजूंना नजरेस पडत होते ते फक्त शुभ्र बर्फाचे साम्राज्य! झाडांच्या फांद्यांवर, डोंगरांच्या उतारांवर आणि रस्त्यांच्या कडेला सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली होती. 

वितळणाऱ्या बर्फाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता खूपच निसरडा झाला होता. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. थंडीची झुळूक, सभोवताली पसरलेला शुभ्र बर्फ आणि डोंगरांमधील शांत वातावरण यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. बर्फात खेळण्याचा आनंद आता काही क्षणांवर येऊन ठेपला होता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता.

थोडे पुढे गेल्यावर रस्त्यालगत असलेल्या एका सुंदर पार्कमध्ये आम्ही थांबलोसमोर दिसणारे दृश्य पाहून क्षणभर आम्ही स्तब्धच झालो. निसर्गाने जणू आपल्या सौंदर्याचा खजिनाच त्या ठिकाणी खुला केला होता. चारही बाजूंना शुभ्र बर्फाची चादर पसरलेली होती. असे वाटत होते की धरतीमातेने स्वतःवर एखादा शुभ्र रेशमी गालिचाच अंथरला आहे. 

दूरवर उंचच उंच पर्वतरांगा बर्फाने झाकल्या गेल्या होत्या. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पांढरेशुभ्र बर्फच दिसत होते. त्या परिसरातील उंच देवदार वृक्षांवरही बर्फाचे जाड थर साचले होते. हिरव्यागार देवदार वृक्षांवर विसावलेला शुभ्र बर्फ निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. काही झाडांच्या फांद्या तर बर्फाच्या वजनाने खाली झुकल्या होत्या. बर्फाने नटलेले ते देवदार वृक्ष एखाद्या चित्रकाराने काढलेल्या निसर्गचित्राप्रमाणे भासत होते

त्या नयनरम्य परिसराचे सौंदर्य डोळ्यांत आणि मनात साठवत आम्ही पार्कमध्ये फेरफटका मारू लागलो. बर्फामध्ये चालताना होणारा आनंद शब्दांत व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे. काही ठिकाणी बर्फाचा थर इतका मऊ होता की त्यावर चालताना पाय अलगद आत जात होता. आजूबाजूला खेळणारी लहान मुले, पर्यटकांची लगबग आणि सर्वत्र पसरलेले बर्फाचे साम्राज्य यामुळे वातावरण अधिकच उत्साही झाले होते.

त्या मोहक दृश्यांचा आस्वाद घेत आम्ही पार्कमध्ये बराच वेळ रमलो. बर्फात चालण्याचा, धावण्याचा आणि खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आम्ही एकमेकांवर बर्फ उडवत मनसोक्त मस्ती केली. बर्फाचे छोटे गोळे बनवून खेळलो, अनेक मजेदार क्षण अनुभवले. 

आम्ही बनवलेला snowman
आम्ही बनवलेला Snowman

 

प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी भरपूर फोटोग्राफी केली. बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर काढलेले फोटो आणि व्हिडिओ आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून राहणार होते. 

वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. जवळजवळ दोन ते तीन तास आम्ही त्या निसर्गरम्य परिसरात घालवले. 

संध्याकाळ जवळ येऊ लागली तसे वातावरण अधिकच थंड झाले. सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी बर्फावर पडणारी चमक मन मोहून टाकत होती. हळूहळू अंधार पडू लागला आणि गार वाऱ्याचा जोरही वाढू लागला. त्यामुळे आता परतीचा प्रवास सुरू करण्याचे आम्ही ठरवले.

ठरलेल्या जागी येऊन आम्ही आमच्या ड्रायव्हरला फोन केला. काही वेळातच तो आला आणि आम्ही पुन्हा कटऱ्याकडे मार्गस्थ झालो. परतीच्या प्रवासात दिवसभर अनुभवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींमध्ये आम्ही रमून गेलो होतो. वाटेत एका छोट्याशा टपरीवर थांबून गरमागरम चहा आणि समोशांचा आस्वाद घेतला. त्या कडाक्याच्या थंडीत गरम चहाचा प्रत्येक घोट शरीराला आणि मनाला एक वेगळीच उब देत होता.

सुमारे साडेसातच्या सुमारास आम्ही हॉटेलवर परतलो. दिवसभराच्या प्रवासामुळे आणि बर्फातील खेळामुळे सर्वजण थकले होते. त्यामुळे काही वेळ रूममध्ये आराम केला. दुसऱ्या दिवशी आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. श्री माता वैष्णोदेवीच्या पवित्र दर्शनासाठी आम्हाला पहाटे लवकर निघायचे होते. त्यामुळे बाहेर जेवायला जाण्याऐवजी रूमवरच जेवण मागवले. शांतपणे जेवण करून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची तयारी केली.

वैष्णोदेवीच्या दर्शनाची ओढ आणि दिवसभराच्या थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर फार वेळ न घालवता आम्ही झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय दिवस ठरणार होता.

क्रमश:


२४ जानेवारी – शुक्रवार
वैष्णोदेवी यात्रा – आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस

आजचा दिवस आमच्या संपूर्ण सहलीतील सर्वात खास, भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव देणारा दिवस ठरला. कारण आज होता माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा दिवस. वर्षभर आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. अशी श्रद्धा आहे की, “माता ज्यांना आपल्या दरबारात बोलावते, त्यांनाच या यात्रेचा योग येतो.” त्यामुळे प्रत्येक वेळी या यात्रेला येताना मनात एक वेगळीच कृतज्ञतेची भावना असते.

यावर्षी आम्ही तिघी मैत्रिणी सातव्यांदा मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. सातव्यांदा दर्शनाचा योग येणं हे आमच्यासाठी खरंच मोठं भाग्य होतं. प्रत्येक वेळी या यात्रेत काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं आणि मातेची कृपा अधिकाधिक जाणवते.

सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व तयारी करून आम्ही यात्रेसाठी सज्ज झालो. हॉटेलच्या वाहनाने आम्हाला बाणगंगा येथे सोडलं. वैष्णोदेवीची यात्रा सुरू करण्यापूर्वी यात्रेची नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणीनंतर मिळणारी यात्रा पर्ची दर्शनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. या पर्चीद्वारे दररोज किती भाविकांनी यात्रा केली याची नोंद वैष्णोदेवी श्राइन बोर्डकडून ठेवली जाते.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही मातेचा जयघोष करत यात्रेला सुरुवात केली.

"जय माता दी!"

या एका घोषणेतच एक वेगळी ऊर्जा, उत्साह आणि भक्ती सामावलेली असते. आजूबाजूला हजारो भाविक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दर्शनाची ओढ आणि मनात अपार श्रद्धा होती.

वैष्णोदेवी यात्रेतील तीन प्रमुख दर्शनस्थळे आहेत :

🔸 अर्धकुंवारी माता
🔸 वैष्णोदेवी भवन
🔸 भैरवनाथ मंदिर

दर्शनी दरवाजातून पुढे गेल्यानंतर यात्रेतील पहिले महत्त्वाचे स्थान लागते ते म्हणजे बाणगंगा.

दर्शनी दरवाजा

पौराणिक कथेनुसार, भैरवनाथ मातेचा पाठलाग करत असताना हनुमानजी तिच्यासोबत होते. प्रवासादरम्यान त्यांना तहान लागल्यावर माताराणीने आपल्या बाणाने भूमीवर प्रहार केला आणि तेथून पवित्र गंगा प्रकट झाली. म्हणूनच या ठिकाणाला बाणगंगा असे नाव मिळाले.

दर्शन दरवाजापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी एका पुलावरून बाणगंगा पार करावी लागते. येथे स्नानघाटही आहेत. अनेक भाविक पवित्र स्नान करून पुढील यात्रा सुरू करतात. आम्हीही त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेतले आणि मातेचे स्मरण करत पुढील प्रवासाला सुरुवात केली.

बाणगंगा

बाणगंगेपासून पुढे यात्रेसाठी घोडे, खच्चर तसेच वृद्धांसाठी डोलीची सुविधा उपलब्ध असते. अनेक भाविक या सुविधांचा उपयोग करतात. मात्र आम्ही सुरुवातीपासूनच संपूर्ण यात्रा पायी पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. मातेच्या नावाचा जयघोष करत आणि एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही पुढे चालत राहिलो.

थोड्याच वेळात आम्ही यात्रेतील आणखी एका महत्त्वाच्या स्थळी – चरण पादुका येथे पोहोचलो.

अशी मान्यता आहे की भैरवनाथ तिचा पाठलाग करत असताना माता येथे थांबली आणि मागे वळून त्याच्याकडे पाहिले. त्या क्षणी तिच्या चरणांचे ठसे तेथे उमटले. त्यामुळे या ठिकाणाला चरण पादुका असे नाव प्राप्त झाले.

मंदिरात दर्शन घेताना मनात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. मातेच्या चरणांचे स्मरण करत काही क्षण तिथे घालवले आणि पुढील प्रवासासाठी तिचे आशीर्वाद घेतले.

यात्रेची खरी चढाई आता सुरू होणार होती.

चरण पादुकानंतर येते **अर्धकुंवारी आणि गर्भजून गुंफा**. 

 


यापूर्वी आम्ही सहा वेळा ही यात्रा केली होती, पण गर्भजून गुंफेचे दर्शन घेण्याचा योग आला नव्हता. येथे मोठी गर्दी असल्यामुळे टोकन क्रमांकानुसार भाविकांना प्रवेश दिला जातो. यावेळी मात्र आम्ही ठामपणे हे दर्शन घेण्याचे ठरवले होते. दुपारी अडीच वाजता आम्ही अर्धकुंवारी येथे पोहोचलो. टोकन घेतल्यानंतर जवळच्या भोजनालयात जेवण करून पुन्हा दर्शनाच्या प्रतीक्षेत बसलो. आमचा क्रमांक जवळ आला असतानाच आरतीची वेळ झाली आणि गुंफा दुपारी चार ते संध्याकाळी सात या वेळेत बंद करण्यात आली. मग काय, आम्ही तिथेच वेळ घालवत बसलो. अंताक्षरी खेळत, गप्पा मारत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळचे सहा वाजले तसे थंडीचाही जोर वाढू लागला. चहा-नाश्ता करून आम्ही आमचे सामान लॉकरमध्ये ठेवले. बूट, मोजे किंवा चामड्याच्या वस्तू गुंफेत घेऊन जाण्यास परवानगी नसते. सर्व सामान ठेवून आम्ही पुन्हा रांगेत जाऊन बसलो. सायंकाळी साडेसात वाजता अखेर आमचा नंबर आला. आम्हाला आतल्या मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आले. तिथेही मोठी रांग होती. पण एकदा आत प्रवेश मिळाल्यावर आता दर्शन नक्की होणार, या भावनेने मन आनंदाने भरून गेले. 
अर्धकुंवारी गुंफा म्हणजे इथे माताराणीने नऊ महिने तपस्या केली होती. चरण पादुका दर्शन घेतल्यानंतर माता पुढे आली. तिला ही गुंफा दिसली. तेथे एक तपस्वी राहत होता. माता त्याला म्हणाली, "मी येथे काही काळ तपस्या करणार आहे. कोणी माझ्याविषयी विचारले तर त्याला काहीही सांगू नकोस." असे सांगून माता गुंफेत प्रवेशली आणि नऊ महिने तेथेच तपस्येत लीन राहिली.

अर्धकुंवारी येथील गर्भजून गुंफा ही वैष्णोदेवी यात्रेतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची जागा मानली जाते. "गर्भजून" या शब्दाचा अर्थच "पुन्हा जन्म" असा होतो. अशी श्रद्धा आहे की, जो भक्त या गुंफेतून जातो त्याला पुनर्जन्माच्या फेऱ्यांमधून मुक्ती मिळते आणि मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

पौराणिक कथेनुसार, भैरवनाथ मातेचा पाठलाग करत असताना माता या गुंफेत येऊन नऊ महिने तपस्येत लीन झाली होती. हे नऊ महिने म्हणजे जणू आईच्या गर्भातील नऊ महिन्यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या गुंफेतून जाणे म्हणजे मातेच्या गर्भातून पुन्हा जन्म घेण्यासारखे मानले जाते.

ही गुंफा अतिशय अरुंद असून काही ठिकाणी तिची रुंदी इतकी कमी आहे की एकावेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकते. अनेक ठिकाणी वाकून, तर काही ठिकाणी अगदी झोपून किंवा सरपटत पुढे जावे लागते. गुंफेतील नैसर्गिक खडक, थंडगार वातावरण आणि "जय माता दी" चा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला असतो.

आम्ही जेव्हा गुंफेत प्रवेश केला, तेव्हा मनात उत्सुकता आणि आनंद दोन्हीही होते. अनेक वर्षे या दर्शनाची इच्छा मनात होती. अरुंद खडकांमधून मार्ग काढत पुढे जाताना जणू आपण मातेच्या गर्भातून प्रवास करत आहोत, अशी अनुभूती येत होती. काही ठिकाणी तर इतकी कमी जागा होती की अक्षरशः झोपून पुढे सरकावे लागत होते. त्या प्रत्येक क्षणी मनात भक्ती, श्रद्धा आणि मातेप्रती कृतज्ञतेची भावना दाटून येत होती.

गुंफेतून पुढे जाताना मनातील सर्व चिंता, ताणतणाव आणि नकारात्मक विचार मागे पडत असल्याचा अनुभव येत होता. सभोवताली "जय माता दी" चा गजर, थंडगार वातावरण आणि समोर असलेले पवित्र स्थान यामुळे मन पूर्णपणे भक्तिमय झाले होते.


एका वळणावरुन दिसणारे भवन 

 

अखेर रात्री दहा वाजता आम्ही अर्धकुंवारी मातेचे दर्शन घेऊन बाहेर आलो. त्या क्षणी मिळालेली अनुभूती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मनाला एक अवर्णनीय शांती, समाधान आणि आनंद लाभला होता. अनेक तासांची प्रतीक्षा, थकवा आणि चढाईचा सर्व शीण एका क्षणात नाहीसा झाला. असे वाटत होते की मातेने आपल्या कुशीत घेऊन सर्व चिंता दूर केल्या आहेत.

आमच्या सातही यात्रांमध्ये हा अनुभव सर्वांत वेगळा आणि संस्मरणीय ठरला. गर्भजून गुंफेचे दर्शन ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती श्रद्धा, संयम, भक्ती आणि आत्मिक समाधान यांचा अद्भुत संगम आहे. त्या दिवशी मातेच्या कृपेची अनुभूती आम्ही मनापासून अनुभवली आणि तो क्षण आमच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला.

रात्री साधारण दहा वाजता आम्ही आदिकुमारी मातेचे दर्शन करून बाहेर आलो. त्या क्षणी मनात जी भावना होती, ती शब्दांत मांडणे खरोखरच अशक्य आहे. अनेक तासांची प्रतीक्षा, चढाईचा थकवा आणि दर्शनाची ओढ या सगळ्यांचा शेवट एका अनामिक समाधानात झाला होता. मन प्रसन्न झालं होतं आणि पुढच्या प्रवासासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली होती.

लॉकर रूममधून सामान घेतल्यानंतर आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. आता कुठेही न थांबता थेट माता भवनाकडे पोहोचायचं होतं. आदिकुमारीपासून पुढे सुरू होणारी हाथी मत्था ही चढाई यात्रेतील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक मानली जाते. खडी चढण, थंड वारे आणि शरीरात जाणवणारा थकवा यामुळे प्रत्येक पाऊल जड होत होतं. तरीही मनात फक्त एकच ध्यास होता – मातेच्या दरबारात पोहोचण्याचा.

थोडं थांबत, विश्रांती घेत आणि "जय माता दी" चा जयघोष करत अखेर रात्री एक वाजता आम्ही माता भवनाजवळ पोहोचलो. इतक्या वेळेच्या प्रवासानंतर भवनाचे दर्शन होताच सगळा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. येथेही सर्व सामान लॉकर रूममध्ये जमा करावं लागतं आणि यात्रेच्या सुरुवातीला मिळालेली यात्रा पर्ची दाखवावी लागते.

सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रात्रीच्या शांत वातावरणात हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर रात्री दोन वाजता तो क्षण आला, ज्यासाठी आम्ही इतका प्रवास केला होता. आम्हाला पवित्र गुंफेत प्रवेश मिळाला.

सध्या पवित्र गुंफेचा जुना मुख्य प्रवेशमार्ग बंद ठेवण्यात आलेला असून भाविकांना नव्याने तयार केलेल्या मार्गाने दर्शनासाठी जावे लागते. आत प्रवेश करताच समोर दिसतात त्या माता वैष्णोदेवीच्या तीन पवित्र पिंडी –

🔸 महालक्ष्मी
🔸 महाकाली
🔸 महासरस्वती

या तीन शक्तींच्या एकत्रित स्वरूपालाच माता वैष्णोदेवी मानले जाते.

पिंडीसमोर बसलेले पुजारी भक्तांकडून चुनरी व भेंट स्वीकारून पूजा करतात. कपाळावर तिलक लावतात आणि प्रसाद देतात. परंतु त्या पवित्र गुंफेच्या आत गेल्यानंतर जे काही अनुभवायला मिळतं, ते शब्दांत सांगणं किंवा कोणत्याही वर्णनातून समजावणं शक्य नाही. त्या ठिकाणची दिव्यता, वातावरणातील ऊर्जा आणि मनाला मिळणारी शांती ही फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे.

दर्शन होताच माझे डोळे नकळत भरून आले. मनात एकच विचार होता – "हेच ते दिव्य रूप, ज्याच्या दर्शनासाठी आपण इतका प्रवास करून येथे आलो आहोत." त्या क्षणी मिळालेली आत्मिक शांती, समाधान आणि आनंद आयुष्यात इतर कुठेच अनुभवता येणार नाही. मनोमन मी मातेसमोर एकच प्रार्थना केली –

"माता राणी, जोपर्यंत हे जीवन आहे आणि माझ्यात शक्ती आहे, तोपर्यंत मला तुझ्या दर्शनासाठी पुन्हा पुन्हा बोलावत राह."

"तु प्रेमाने बोलावत राह फक्त... जय माता दी!" 🙏❤️

दर्शनानंतर आम्ही बाहेर आलो. मन पूर्णपणे तृप्त झालं होतं. आता शरीरालाही थोडी विश्रांती आणि अन्नाची गरज होती. जवळच असलेल्या भोजनालयात जाऊन आम्ही थोडं खाऊन घेतलं.

माता वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर पुढील महत्त्वाचे दर्शन म्हणजे भैरवनाथ मंदिर. अशी मान्यता आहे की भैरवनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण मानली जात नाही.

माता भवनापासून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे भैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. पौराणिक कथेनुसार, मातेने भैरवनाथाचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचे मस्तक पडले, त्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले.

समुद्रसपाटीपासून सुमारे ६७०० फूट उंचीवर वसलेले हे मंदिर माता दरबारापासून जवळपास २.५ किलोमीटर अंतरावर आहे. लाखो भाविक आजही ही परंपरा जपत भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.

मात्र त्या वेळी आम्ही सर्वजण अत्यंत थकलो होतो. माता भवन ते भैरवबाबा रोप-वेची सुविधा उपलब्ध होती, पण ती रात्री दहा वाजताच बंद होत होती. आम्ही तर रात्री दोन वाजता भवनात पोहोचलो होतो. त्यामुळे आता पुढे जाणे सर्वांसाठी कठीण होत होते.

सर्वांनी चर्चा करून शेवटी तिथूनच भैरवनाथ बाबांना नमस्कार केला आणि परतीचा मार्ग स्वीकारला. लॉकरमधून सामान घेतल्यानंतर आम्ही हळूहळू उतरण्यास सुरुवात केली.

चालत चालत आम्ही पुन्हा अर्धकुंवारी परिसरात पोहोचलो. येथे वैष्णोदेवी श्राइन बोर्डने "ताराकोट मार्ग" नावाचा नवीन मार्ग विकसित केला आहे. या मार्गानेही कटऱ्याकडे परत जाता येते.

नेहमीच्या मार्गावर घोडे, खेचर आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे उतरताना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो. अर्धकुंवारीजवळ आल्यानंतर आम्हाला ताराकोट मार्ग दिसला. हा मार्ग तुलनेने रुंद, स्वच्छ आणि शांत असल्यामुळे आम्ही याच मार्गाने खाली जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यावेळी आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहीत नव्हती – हा मार्ग नेहमीच्या मार्गापेक्षा जवळपास दोन किलोमीटरने अधिक लांब आहे!

आम्ही उतरण्यास सुरुवात केली. काही अंतर गेल्यानंतर लक्षात आलं की या मार्गावर आमच्याशिवाय जवळजवळ कोणीच नाही. संपूर्ण रस्ता शांत होता. मात्र श्राइन बोर्डने या मार्गावर उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ शौचालये आणि आरामासाठी जागोजागी बसण्याची व्यवस्था असल्यामुळे प्रवास सुखकर होतो.

पण आता आमच्या शरीराची साथ सुटायला लागली होती. रात्रभर जागरण, अनेक किलोमीटरची चढाई-उतार आणि दर्शनासाठी केलेली प्रतीक्षा यामुळे आम्ही पूर्णपणे थकलो होतो. मनात एकच विचार चालू होता – "आता कधी एकदा हॉटेलच्या खोलीत जाऊन आराम करतो!"

चालत-चालत अखेर पहाटे साडेपाच वाजता आम्ही कटऱ्यात खाली पोहोचलो. मी सर्वांत आधी खाली आले. खाली येताच हॉटेलमध्ये फोन करून गाडी पाठवण्याची विनंती केली आणि बाकीच्या सर्वांची वाट पाहत बसले.

थोड्याच वेळात एक-एक करत सगळेजण खाली आले. सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ग्रुपमधील प्रत्येक जण अक्षरशः दमून गेला होता. आणि त्यात मीच सर्वांना ताराकोट मार्गाने आणण्याचा सल्ला दिला होता! त्यामुळे सगळे माझ्याकडे थोड्या रागानेच पाहत होते. माझ्यामुळे त्यांना दोन किलोमीटर जास्त चालावं लागलं होतं. खरं सांगायचं तर ही गोष्ट मलाही आधी माहीत नव्हती; ती नंतरच कळली. त्या क्षणी मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मला हसूही येत होतं आणि अपराधीही वाटत होतं.

काही वेळाने गाडी आली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकत हॉटेलकडे रवाना झालो.

२५ जानेवारी – शनिवार कटऱ्यातील शेवटचा दिवस

सकाळी साधारण ६:३० वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. खोलीत पोहोचताच हात-पाय धुतले, कपडे बदलले आणि अक्षरशः बेडवर कोसळलो. शरीरात अजिबात ताकद उरली नव्हती. काही क्षणांतच आम्ही सर्वजण गाढ झोपलो.

दुपारी कधी वेळ गेला ते कळलंच नाही. संध्याकाळी चारच्या सुमारास जाग आली तेव्हा शरीर थोडं हलकं वाटत होतं. मी सर्वांच्या रूममध्ये फोन करून त्यांना उठवलं आणि तयार व्हायला सांगितलं. आज कटऱ्यातील आमचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रसाद, ड्रायफ्रूट्स आणि काही आठवणी सोबत घेण्यासाठी बाजारात जायचं ठरवलं.

सर्वजण तयार होऊन बाहेर पडणार इतक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळ आम्हाला हॉटेलमध्येच थांबावं लागलं. जवळपास अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि आम्ही त्या रम्य रिमझिम सरींमध्ये बाजाराच्या दिशेने निघालो.

बाजारात फिरताना आम्ही एका फोटो स्टुडिओमध्ये गेलो. तिथे आम्ही मुलींनी पारंपरिक काश्मीरी पेहराव परिधान करून फोटो काढले. तसेच वैष्णोदेवीच्या पिंडीसमोर एक सुंदर ग्रुप फोटोही काढला. स्टुडिओमध्ये वैष्णोदेवी दरबाराची हुबेहुब प्रतिकृती उभारलेली होती, त्यामुळे फोटो अधिकच आकर्षक झाले.

त्यानंतर प्रसाद, बांगड्या, अक्रोड, केशर आणि इतर काही वस्तूंची खरेदी केली. प्रवासाच्या आठवणी म्हणून या छोट्या गोष्टी नेहमीच खास असतात.

खरेदी पूर्ण झाल्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केलं आणि रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी जम्मूला रवाना व्हायचं असल्याने सर्व सामानाची नीट बांधाबांध केली. कटरा ते जम्मू हा प्रवास साधारण दीड तासांचा असल्यामुळे वेळेत निघणं आवश्यक होतं.

सर्व तयारी पूर्ण करून आम्ही पुन्हा विश्रांतीसाठी झोपलो.

२६ जानेवारी – रविवार - (कटऱ्याहून जम्मूकडे आणि पुढे जोधपूरच्या दिशेने)

आज पहाटेच चार वाजता उठलो. वैष्णोदेवी यात्रेचा अविस्मरणीय अध्याय संपला होता आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. आमची जाट-आदी एक्सप्रेस जम्मूहून सकाळी ७:४० वाजता सुटणार होती. त्यामुळे सर्वजण आवरून सकाळी सहा वाजेपर्यंत गाडीत बसलो.

सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती आणि आम्ही सुमारे ७:१५ वाजता जम्मू रेल्वे स्थानकावर पोहोचलो.

तो दिवस प्रजासत्ताक दिन असल्यामुळे संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने आमच्या वाहनाला स्टेशनच्या अगदी जवळ जाऊ दिलं नाही. त्यामुळे सर्व सामान घेऊन आम्हाला पायीच जावं लागलं. आमच्याकडे बरंच सामान असल्याने दोन हमालांची मदत घ्यावी लागली.

आम्ही आमच्या बोगीजवळ जाऊन थांबलो. ट्रेन फलाटावर उभी होती, पण दरवाजे अद्याप उघडले नव्हते. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर दरवाजे उघडले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकत आमच्या जागेवर जाऊन बसलो.

आजचा संपूर्ण दिवस ट्रेनमध्येच जाणार होता. मागील काही दिवसांचा प्रवास आणि दर्शनाचा थकवा अजूनही जाणवत होता. त्यामुळे ट्रेन सुरू होताच आम्ही थोडी विश्रांती घेतली. दिवसभर गप्पा, खाणं-पिणं, खिडकीतून दिसणारी दृश्यं आणि मधूनमधून घेतलेल्या डुलक्या यामध्ये वेळ कसा गेला ते समजलंच नाही.

रात्री दहाच्या सुमारास आम्ही झोपायची तयारी केली. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३५ वाजता जोधपूरला पोहोचायचं होतं.

वैष्णोदेवीच्या पवित्र आठवणी मनात साठवत, मातेच्या कृपेची अनुभूती हृदयात जपत आणि पुन्हा एकदा तिच्या दरबारात येण्याचा संकल्प करत आम्ही निद्राधीन झालो.

क्रमशः... 🙏🚩✨
जय माता दी! 🌺: 
















































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...