तयारी, भाग १
राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.
आम्ही सात जण जाणार होतो. पैकी सहा जण पुण्यातून आणि एक जण गुडगावमध्ये जॉईन करणार होते. आम्ही सप्टेंबरमध्येच जाण्याची 'एअर इंडिया' आणि परतीची इंडिगोची विमान तिकीट बुक केली. “हे पाहू, ते पण पाहू” करत करत अखेर १४ दिवसांची ट्रिप ठरली. “परत कधी येणार आहे, आताच पाहू” असे म्हणत आम्ही हा भारी-भक्कम प्लॅन आखला.
नुसती तीन महिने आधी तिकीट बुक करून आम्ही खुश होतो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा हॉटेल बुक करायला लागलो, तेव्हा हॉटेल्सचे दर तिप्पट वाढलेले दिसले. जवळपास दोन महिने हॉटेल्स, Airbnb शोधणे, काय पाहायचे त्याची यादी करणे सुरू होते.
आमचे दादा-वहिनी परत इकडे येतील याची शक्यता खूप कमी असल्यामुळे ताजमहाल पाहायचे ठरवले. तीनदा दिल्लीला जाऊनही संसद भवन पाहायचे राहून गेले होते, म्हणून तेही कव्हर करायचे होते. कोण तिकडे फिरायला गेले आहे, काय चांगले आहे यावर ऑफिसमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा झाल्या. भरपूर व्हिडिओ पाहिले.
“एअर इंडिया चे तिकीट कशाला काढलेस?” म्हणून मला प्रत्येकाने सुनावले, पण नंतर इंडिगोचा गोंधळ पाहून मी स्वतःला नशीबवान समजले.
जातेवेळीची फ्लाइट सकाळी साडेसहाला होती आणि साडेआठला पोहोचणार होती. दिवसभर आम्ही दिल्लीमध्ये जे पाहता येईल ते पाहून दुसऱ्या दिवशी आग्र्याला मुक्कामाला जाणार होतो. पण अचानक एअर इंडियाकडून फ्लाइट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला. त्यांनी दोन ऑप्शन दिले – रि- शेड्यूल करा नाहीतर रिफंड घ्या. आम्ही आधीच हॉटेल बुक केली होती, त्यामुळे दिलेल्या दोन ऑप्शनपैकी एक आम्ही रीश्येडूलचा पर्याय निवडला.आमच्या पैकी दोन जण पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होते, त्यामुळे त्यांना विमानातून खाली शहर दिसावे म्हणून तीन विंडो सीट मिळतील अशा पद्धतीने सहा सीट बुक केल्या, होत्या. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजले होते पण फ्लाइट कॅन्सल झाल्यावर दुसरी निवड करताना सीटबद्दल विचारायचे आम्ही पूर्णपणे विसरलो.
जेव्हा बोर्डिंग पास हातात आले, तेव्हा शेवटच्या ओळीतल्या सहा सीट आम्हाला मिळाल्या होत्या. त्यात विंडो शेजारी बसलेल्यांना नुसता विमानाचा पत्राच दिसत होता. आम्ही सगळे एकाच ओळीत बसलो होतो. रात्रीची वेळ असल्याने सगळे विमानात झोपले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर मात्र थंडीत अक्षरशः गारठून गेलो.
आधीच्या वेळेनुसार आम्ही दिल्लीला पोहोचून संसद भवन, इंडिया गेट पाहून रात्री आग्र्याला जाणार होतो. पण वेळ बदलल्यामुळे “दिल्लीला पोहोचल्यानंतर काय करायचे ते तिथे ठरवू” असे ठरवले आणि थेट वृंदावनला जायला निघालो. दादा-वहिनींना वृंदावनातील बांके बिहारी आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमी पाहायचे होते, म्हणून त्याप्रमाणे जायचे ठरवले.
पूर्ण पंधरा दिवसांत रोज काय पाहायचे, एका दिवसात किती स्थळे पाहायची, सगळे नाही जमले तर काय सोडायचे—याचे पूर्ण नियोजन केले होते. त्यासाठी गुगल शीटवर तारखेनुसार आणि वेळेनुसार स्थळे, हॉटेल्स, प्रवासाची वेळ अशी सगळी माहिती भरली होती.
हॉटेल बुक करणे हे एक दिव्यच होते. रेटिंग, बजेट, रिव्ह्यू, तारखा जुळवणे—सगळेच कठीण होते. प्रत्येक ठिकाणी फोन करून विचारायचो की सात लोकांना दोन रूम मिळतील का, आम्ही निवांत झोपू शकू का, आणि २४ तास गरम पाणी मिळेल का. बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स तीन रूम घ्या असे सांगत होते, पण त्यामुळे बजेट खूप वाढणार होते. पुन्हा फोन, पुन्हा तेच प्रश्न—असेच जवळपास दोन महिने चालले.
शेवटी आम्ही तीन ठिकाणी होम स्टे, तीन ठिकाणी हॉटेल आणि वाळवंटात सॅंड ड्युन कॅम्प बुक केला.
ठिकाण हॉटेल / होम स्टे कालावधी आमची रेटिंग
ब्रज निवास हॉटेल (फक्त फ्रेश होण्यासाठी) २ तास ⭐⭐⭐
आग्रा गोयल पॅलेस १ दिवस ⭐
जयपूर लीला होम स्टे ३ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
उदयपूर घराना Airbnb २ दिवस ⭐⭐⭐
जोधपूर हॉटेल स्टार इन २ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज २ दिवस ⭐⭐⭐
सॅंड ड्युन प्रिन्स डेजर्ट कॅम्प १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज १ दिवस ⭐⭐⭐
दिल्ली होम स्टे, ग्रेटर कैलाश १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
आणखी बरीच तयारी केली—उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ, बॅगांचे वजन, किती बॅगा घ्यायच्या, औषधे इत्यादी.
सर्वात महत्त्वाची तयारी होती ती दिल्लीपासून परत दिल्लीला येईपर्यंत फिरण्यासाठी कॅबची. आम्ही इनोव्हा क्रिस्टा बुक केली. जरी आम्ही सात जण असलो, तरी त्यात १२ वर्षांवरील दोन मुले होती, त्यामुळे कॅरियर असलेली कॅबच घेतली. ही कॅब आम्ही गुगलवर शोधली होती आणि त्यांनी खरंच अफलातून सर्व्हिस दिली. कोणी विचारले तर मी नक्की डिटेल्स देईन.
सर्वात महत्त्वाची तयारी बॅगांची होती. त्या कॅरियरवर मावतील अशाच घ्यायच्या होत्या आणि फक्त चारच बॅगा घ्यायच्या ठरवल्या. त्यात एक तीन-बॅगांचा सेट आणि एक मिडियम साईज बॅग घेतली.
बरंचसं खाण्याचं सामान, मास्क, मेकअप साहित्य, मॅगी, चहा, साखर इत्यादी आमच्या गुडगावच्या मेंबरने आणले.
पुढील सर्व ट्रिपचे रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी आणि राजस्थान का पहायचे होते हे वाचण्यासाठी भेटूया पुढच्या भागात...
डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही दिल्ली एअरपोर्टवर पहाटे ५ वाजता पोहचलो. फ्रेश होऊन कॅब ज्यांची होती त्या प्रदीप भाईंना फोन केला , त्यांनी आमच्या बरोबर येणाऱ्या ड्राइव्हरचा फोन नंबर शेअर केला होता. त्यांनाही फोन केला. त्यांनी १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि पोहचलेसुद्धा. बॅगा कॅरीअरवर चढवून आम्ही वृंदावनला निघालो. जाताना आमच्या गुडगावच्या मेंबरला घेतले. तिने खाण्याचे पदार्थ, साखर, पावडर, कॉफी, मॅगी , शॅंपू, साबण असे सामान आणले होते. ते डिकीत चढवले . यमुना एक्सप्रेस वे वरून आम्ही वृंदावनला निघालो.
डिसेंबरमध्ये दिल्ली भागात प्रचंड धुके असते. खरेतर रात्रभर जागुन प्रचंड झोप आली होती तरीही समोरची धुके पाहुन गाळण उडाली. वेग अत्यंत कमी होता. मधुनच कोठे ट्रक आडवा येतोय, गाडी येतीय, अगदी समोर आली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारल्यावर काही समोर आहे याचा पत्ता लागायचा. अजूनच घाबरायला होत होते. सकाळी ९-९ः३० वाजले तरी धुके होतेच. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर मात्र भितीचा लवलेश नव्हता. हिटर लावुन ते निवांत गाडी चालवत होते.
१०ः३० च्या दरम्यान आम्ही वृंदावनात पोहचलो. प्रचंड थंडी, स्वेटर, शाल , कानटोपी , शुज, मोजे घालुन बसलेले तरीही थंडी वाजतच होती. ब्रजनिवास या हॅाटेल ला आम्ही फोन केला, फक्त फ्रेश व्हायचे होते, सातमधल्या दोन जणांनी फक्त अंघोळ केली कारण पाणी गरम होत नव्हते. वृंदावन मथुरा येतील सर्व मंदिरे सकाळी ८-९ वाजता चालु होवून दुपारी बारा/एक वाजता बंद होतात. दुपारी ४ वाजता पुन्हा उघडून रात्री ८-९ ला बंद होतात. आम्ही फक्त बाके बिहारी मंदीर आणि निधी वन पाहणार होतो. दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असते. लोक मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर जी प्रसाद, फुलं वैगेरे साठी जी दुकान होती त्यांच्याकडे चप्पल, शूज ठेवतात. अतिशय अरुंद गल्ल्या , त्यामुळे गाडी आपल्याला कोठेतरी लांब अंतरावर सोडते. तिथुन पुढे ई- रिक्षा आपल्याला मंदिराच्या जवळच्या गल्लीत सोडतात. सातही जणांना एका रिक्षात कोंबून आम्ही जवळपास च्या गल्लीत पोहचलो . २०० रुपये घेतले. तिथुन पुढे लोक पळत आहेत तिकडे पळायचे. वृंदावनात माकडे चष्मा, गॉगल पळवतात त्यामुळे तो गाडीतच ठेवुन जायचा पण मुलं ऐकत नसतात. आम्ही पर्स मध्ये ठेवतो म्हणुन घेतलाच. कानात वारे भरते त्यांच्या, त्यामुळे आपण काही सांगितले तरी ते ऐकत नसतात.
प्रचंड गर्दी , उघडी गटारे, खच्च भरलेले रस्ते. फुल प्रसादाची दुकाने, मुंग्यासारखी माणसं…
जय कन्हैया लाल की , हाथी घोडा पालखी .
राधे राधे , राधे राधे..ने सर्व परिसर नुसता दुमदुमत असतो . जयघोष सुरु असतो . भक्त टाळ्या वाजवत असतात. भजन म्हणत असतात.
बाके बिहारी मंदिराच्या दर्शन रांगेत आम्ही उभे राहयलो. अंतराळीच मंदिरात पोहचलो. गर्भग्रुहाचा पडदा उघडत होता . झाकत होता. फुलांची परडी , हार देण्यासाठी देणगी मागत होते नाहीतर तो हार त्या हारांच्या ढिगाऱ्यात फेकायचे आणि अंतराळीच दुसरीकडे कोठेतरी बाहेर पडायचे . परत चप्पल, शूज मिळवण्यासाठी गल्ली शोधायची, मग आपल्या चपला बुटे त्या ढिगातुन शोधायचे. नशीब असेल तर दोन्ही वेळेवर मिळतात अन्यथा दुसरी चप्पल बुट शोधायला अर्धा तास पक्का.
मागे एकदा आम्ही आणि आमची मुलगी असे आम्ही वृंदावन ला गेलो होतो. २-३ तास रांगेत उभे राहिल्यावर माझी मुलगी मी आता रांगेत थांबणार नाही म्हणाली. प्रचंड पाय दुखत होते पण तिला तसेच समजावून सांगत होते तोवर एक मोठा सांड गर्दीत घुसला. लोक त्याची शेपटी पिरगाळत होते. उधळला तर काय होईल? 40-50 तरी नक्की मरतील अशी परिस्थिती होती पण लोक तरीही त्याला चुचकारत होते. मग मात्र माझी मुलगी रांग सोडुन मागे जायला लागली. सर्व लोक आम्हाला दर्शन न घेता चाललो म्हणुन काहीही बोलत होते. शेवटी आम्ही त्या दिवशी दर्शन घेतले नाही. मथुरा आग्रा पाहुन तिसऱ्या दिवशी सकाळी मी एकटीने दर्शन घेतले.
असो , हे अवांतर सांगितले आणि त्याला कारण पणतसेच आहे. यावेळी मुलीने दर्शन रांगेत उभा राहण्यास किरकिर केली नाही. कारण मुलीच्या ॲाफिसमधले तिला म्हणाले होते,
“बाके बिहारी का बुलावा आता है, ऐसेही नही जाता कोई वृंदावन”
बाके बिहारी दर्शन करुन आम्ही निधी वनात गेलो. भगवान कृष्ण तिथे रासलीला रचतात. रात्री तिथे कोणीही जात नाही नाहीतर आंधळे होतं अशी आख्यायिका आहे. पुर्ण जाळीने पॅक केलेल्या तुळशीच्या वनातून आमचे एक एक पाऊल पुढे पडत होते. भजन म्हणत होते, फुलांच्या परड्या सावरत त्यातुन मार्ग काढत होते.
राधे राधे राधे राधे
परिसर नुसता दुमदुमून गेला होता. त्यातही जाळीवरुन माकडे उड्या मारत होती. एका छोट्याशा मंदिरात कृष्णाची सेज रात्री सजवतात आणि सकाळी ती अस्ताव्यस्त होत असते अशीही आख्यायिका आहे.
लोक राधाराणीला साज शृंगार पेटी चढवत होते, बांगड्या, कुंकु पावडर, अत्तर, साडी असे त्या पेटीत असते, काही लोक दक्षिणा देतात.
माझी मुलगी गर्दीतुन वाट काढत तिच्या चुलत बहिणीला घेवुन वाट काढत पुढे जात जिथे थोडी रिकामी जागा आहे तिथे जाळीला पाट टेकून उभी राहिली. त्या जाळीजवळ येऊन माकडाने तिचा चष्मा एवढ्या छोट्या जाळीतुन ओढला , लोकांनी जवळचे लाडू, प्रसाद दिले त्या जाळीतुनच पण माकडाने लाडू खाल्ले पण चष्मा काही दिला नाही. तिने ५ हजार खर्चून तो लेन्सकार्ट मधुन दोनच दिवसांपूर्वीच घेतला होता. मी तिच्यावर चष्मा का घातलास म्हणून आणि ती माझ्यावर तु ह्या निधी वनात कशाला घेवुन आलीस म्हणुन करवादत होती.
सगळा मुड गेलेला, भुक लागलेली. आम्ही गुगलवर रेटिंग पाहुन एक हॅाटेल निवडले. रिक्षा वाल्यांना तिथे पोहोचायला सांगत होतो पण कोणालाही ते कोठे आहे माहीत नव्हते. शेवटी एक रिक्षावाला म्हणाला, “कहासे ढुंढा है, ब्रजवासी में जाओ!”
आम्ही तिथे गेलो, जेवण खुप छान होते. सेल्फ सर्व्हीस आहे. जेवुन बाहेर येवुन आमच्या गाडीची वाट पाहत होतो तोवर तिथे आलेल्या अजुन एकाचा चष्मा (आमच्यापैकी नाही )माकडाने पळवला. मुलीने परत मला वृंदावनात आल्याबद्दल सुनावले.
नंतर आम्ही मथुरेला गेलो , कृष्णजन्मभुमी पाहिली, माझी मुलगी तिथेही आत आली नाही. रात्री आम्ही आग्र्यात मुक्कामी पोहचलो. तिथले गोयल पॅलेस नावाचे हॅाटेल आम्ही बुक केले होते. प्रचंड थंडीमुळे सर्व ठिकाणी छोट्या छोट्या कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या होत्या. आमची रुम तिसऱ्या मजल्यावर होती, लिफ्ट नव्हती, बॅग वर चढवायला कोणीही हेल्पर नव्हता. हॅाटेल बुक करताना तो माणूस प्रचंड गोड बोलत होता. ऐनवेळी हॅाटेल चेंज करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी पीक सिजन असल्याने दर अतिशय महाग होते आणि बुकिंग फुल होते.गरम पाणी सकाळीच मिळणार होते, एक्सटेंशन फोन चालत नव्हते. अतिशय थंड पाण्याने फ्रेश झालो. जेवायला त्यांच्याच दुसऱ्या जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. अतिशय घाणेरडे जेवण.. जाता जात नव्हते.
सकाळी अंघोळ करुन आम्ही बॅगा कॅरीअर वर चढवल्या. रस्त्यात देवीराम स्विटस् मध्ये आम्ही बेडई पुरी , जिलबीवर ताव मारला. सकाळी सकाळी प्रचंड गर्दी होती.चव अप्रतिम होती. नाश्ता करुन आम्ही ताजमहाल पाहायला गेलो.
गाडी पार्किंग पासून पुढे १ ते १.५ किलोमीटर चालत जावे लागते. तिथे असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्ट मधुन ताजमहालला पोहोचलो. गाडी पार्क करेपर्यंत हजार लोकं विचारायला येतात, गाईड आणि गाडी साठी पण तिथुन सरळ पुढे गेल्यावर सरकारी कार्ट असतात, त्यांचा रेटही २० रुपये पर पर्सन असतो. आरामात पोहचलो. तिकीट ॲानलाईन काढले होते. प्रचंड गर्दी,आत जाण्यासाठी भरपूर गेटस्, चेकिंग. पाणी नेता येत पण खाण्यासाठी काहीही नेता येत नाही. कडक चेकि्ग करतात. आत गेलो पण ताजमहाल धुक्यात हरवला होता. इतकी गर्दी असुनही आत आल्यावर ती गर्दी ताजमहालात सामावली आणि तरीही भरपूर रिकामी जागा होती इतका मोठा परिसर आहे. शू कवर घालून आपल्याला मुख्य इमारती मध्ये प्रवेश मिळतो. वर जाण्याचे वेगळे तिकीट आहे, आत ताजमहाल , म्युझियम आणि मशिद आहे , सुंदर बाग आहे. ऊन अजिबात नव्हते, सकाळच्या वेळी ताजमहाल अतिशय सुंदर दिसतो. तो एक अनुभव आहे.
ताजमहाल पाहुन आम्ही आग्रा फोर्ट पाहिला, शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याच्या फोर्ट समोर आहे. मन भरून येते तो पुतळा पाहुन. इथे गाईड आवर्जून घ्यावा , छान माहिती सांगतात, छान फोटो काढतात.
फोर्ट पाहुन आम्ही जयपूर ला निघालो. रात्री ९.३० च्या दरम्यान आम्ही जयपूरला पोहचलो.
इथुन पुढे राजस्थान ट्रिप चालु.. त्याविषयी तिसऱ्या भागात…
रात्री ९:३० च्या दरम्यान आम्ही लीला होम स्टे ला पोहचलो. अतिशय चांगले एअर बी ॲंन्ड बी आहे. शहराच्या थोडे बाहेर आहे पण आमच्याकडे गाडी होती त्यामुळे काही फरक पडला नाही. त्या रात्री आम्ही बाहेरून झोमॅटावरुन काही बाही मागवले. तिथे बिसलरी पाणी बॅाटल्स, चहा पावडर, कॅाफी एनर्जी ड्रिंक्स, भांडी असे बरेच साहित्य होते. ३ बेडरूम, मोठा हॅाल, टिव्ही, गिझर असे बरेच साहित्य होते. त्यामुळे इथला स्टे खूपच सुखकर होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून आवरले आणि सकाळी साडेआठच्या दरम्यान हवामहालाजवळ पोहचलो. फोटो काढले आणि नंतर आत हवामहाल पाहण्यास गेलो. हवामहाल पाहण्यास २ तास खुप होतात. एका बाजूला जीने आणि दुसऱ्या बाजूला चालत ही वरच्या मजल्यावर जाता येते. छोट्या छोट्या खिडक्या, आरशांचे नक्षीकाम आणि खुप सारी दालने. ह्या खिडक्यातुन आपण रस्त्यांवर चाललेली वाहतुक पाहु शकतो, वरून आपण सर्व पाहु शकतो पण खालून पाहणार्यांना आपण दिसत नाही. मुख्य आकर्षण त्या आरशाचे नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि दालने इतकेच आहे. ती हवामहालाची इमारत जितकी फोटोत सुंदर दिसते तितकी दिवसा सुंदर दिसत नाही. रात्री समोरच्या कॅफेतुन खुप सुंदर दिसते असे म्हणतात पण त्या कॅफेचे रेट्स खुप आहेत आणि वेटिंगपण खुप असते म्हणुन आम्ही रात्री गेलो नाही.
हवामहल पाहुन आम्ही सिटी पॅलेस पाहायला गेलो. सिटी पॅलेस मध्ये म्युझियम, सर्वात मोठे झुंबर , सर्वात मोठे चांदीची गंगाजली, शस्त्रे , पुर्वी पासुनची वाहने जसे की मेने, पालख्या , अंबाऱ्या, जुन्या बग्ग्या , हत्तींची आभूषणे, राजा महाराज्यांचे कपडे असे बरेच पाहण्यासारखे आहे. सिटी पॅलेस मध्ये आम्ही गाईड घेतला होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आताचा राजा जो त्यांच्या मुलीचा मुलगा आहे , राजा पॅलेस मध्ये आहे की नाही कसे ओळखायचे वगैरे.. कोणत्या राजाने जयपूर वसवले .. असे बरेच काही. ते पाहता पाहता ऐकणे ह्यात वेगळीच मजा आहे. आजही ह्या पॅलेस मध्ये काही भागात राजाचे वास्तव्य आहे. तिथे आतमध्ये पश्मिना शालींचे दुकान आहे. ते दुकान राजाने त्यांच्या खानदानी शाली पुरवणार्या कुंटुबाला दिले आहे. ह्या शाली विशेष जातीच्या मेंढ्या च्या दाढी च्या तेलापासून कश्मीर मध्ये बनतात पण त्यावरचे रंगकाम राजस्थानात बनते. ही शाल उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम आणि अतिशय पातळ असते. ती ओरिजनल आहे की नाही हे ओळखायची खुण म्हणजे ती जळल्यावर केस जळाल्याचा वास येतो. हे प्रात्यक्षिक ते करुन दाखवतात. छोट्या रिंग मधुन ती आख्खी शाल पास होते. किमतीही प्रचंड आहेत. सर्व पाहुन झाल्यावर गाईड आपल्याला त्या दुकानात घेवुन जातात. पण इंटरनेट वर ते फसवतात असा रिव्ह्यू आहे त्यामुळे माझी इच्छा असतानाही घरचेयांननी घेवु दिली नाही.
आम्ही गेलो त्या दिवशी संध्याकाळी तिथे एक लग्न होणार होते त्यासाठीची सजावट चालली होती त्यामुळे काही भाग पाहता आला नाही त्यामुळे अतिशय वाटले कारण सिटी महाल पाहण्यासाठीचे तिकीट दर माणशी ३१० रुपये होते. २ तासात सिटी महाल पण पाहुन होतो.
अजुन एक गोष्ट इथे समजली ती म्हणजे जयपूर हे शहर राजा सवाई जयसिंग यांना पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी किल्ल्याच्या खाली शहर वसवले आणि त्यांच्या नावावरून जयपूर हे नाव पडले.
सिटी महालानंतर आम्ही जंतरमंतर ला गेलो. जंतरमंतर ही सुर्य नक्षत्रे यांच्या स्थानांवर आधारित एक प्रयोगशाळा आहे . भाततात अशा ५ जंतरमंतर आहेत पण सर्वात मोठे जयपूरला आहे. ह्या सर्व राजा जयसिंग दुसरा यांनी बांधलेल्या आहेत. तिथे सुर्याच्या उन्हावर किती वाजले ते ओळखण्याचे घड्याळ आहे, म्हणजे खरंतर ती एक स्केलच आहे. अचूक वेळ दाखवते. इथे आम्ही गाईड न घेतल्याने फार काही माहिती नाही मिळाली.माणुस जिथे जातो तिथे तो घाण करतो त्यामुळे ह्यातील बराच भाग आता पाहता येत नाही.
हे सर्व पाहोपर्यंत दुपारचे दोन अडीच वाजले. प्रचंड भुक लागली होती. जेवण्यासाठी आम्ही चांगले रेटिंग असलेले हॅाटेल गोविंदम शोधले. गोविंदम मध्ये छोट्या लोखंडी जिन्याने वर चढुण जायचे , त्यावर चढताना वर एवढे चांगले हॅाटेल आहे असे वाटलेच नाही . पण हॅाटेल अतिशय चांगले आहे. प्रचंड भुक लागली होती , पण वेटिंग टाईम खुप होता. अतिशय सुंदर आवाजात दोन गायक तबला पेटी वाजवत गात होते. काही कस्टमर त्यांना रेकॅार्ड करत होते. त्यातील राजस्थानी थाळी ७०० रुपये होती. मी आणि वहिनी दोघींनी ती घेतली , थाळी अतिशय चविष्ट होती. पण बाकीच्यांनी पंजाबी जेवण मागवले आणि ते बेचव होते. जेवणाच्या किमतीच्या मानाने राजस्थानी जेवण चांगले पण पंजाबी बेचव. रेटिंग च्या बाबतीत आमचे दोन गट पडले. आम्ही ५ स्टार देवु इच्छित होतो तर बाकीचे १ स्टार वर ठाम होते.
जेवण करुन बाहेर यायला चार साडेचार झालेले, शेवटी आम्हाला अल्बर्ट हॅाल पाहायचा होता. जयपूर ला पिंक सिटी का म्हणतात तर ह्याला हे अल्बर्ट साहेब कारणीभूत आहेत . त्यांच्या स्वागतासाठी राजा सवाई राम सिंह यांनी सर्व शहरांच्या इमारती ह्या टेराकोटा पिंक कलर मध्ये रंगवल्या. त्यामुळे तिथले सर्व घरे गुलाबी दगडात बांधली आहेत वैगेरे सर्व खोटं आहे.
अल्बर्ट हॅाल म्हणजे एक म्युझियम आहे , ह्यात विविध चीनीमातीची भांडी, सुंदर नक्षीकाम केलेल्या फ्रेम्स असे बरेच काही आहे. बाहेरच असणाऱ्या छोटेखानी कॅन्टीन मध्ये आम्ही चहा पिला , दिवसभर चालून पाय दुखत होते पण त्या दिवसाचा शेवटचे स्थळ चोखीदानी होती. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आम्हाला सकाळी हवामहल ला सोडुन पार्किंग साठी निघुन गेला. हवामहल, सिटी पॅलेस, जंतरमंतर वॅाकिंग डिस्टन्स वर आहे. गोविंदम ला आम्ही रिक्षाने गेलो. तिथुन पुढे आम्ही गाडीने अल्बर्ट हॅाल ला गेलो आणि नंतर चोखीदानी ला पण गाडीने गेलो. चोखीदानीचा पार्किंग साठी मोठी जागा आहे.
चोखीदानी पुण्यात पण आहे आणि मी पाहिलं आहे पण बाकींच्यांना खुप उत्साह होता. चोखादानीचा दर माणशी १२०० रुपये रेट होता. संध्याकाळी पाच नंतर चालु होते. तिथले ढोल वाजवत होणारे स्वागत, तिलक लावुन सरबत देतात. अतिशय छान वाटते. लोक त्या ढोलाच्या तालावर नाचायला लागतात.
आतमध्ये विविध खेळ, कटपुतली, विविध राजस्थानी कला यांचे प्रदर्शन असते . परातीवर, परातीत काचा टाकून , एकावर एक हांडे ठेवुन काही स्त्रिया डान्स करतात. जादुगर, डोंबारी खेळ, विविध आदिवासी डान्स असे बरेच काही असते. लोक स्वतः पण त्यांच्या बरोबर डान्स करत असतात. बाजेवर बसुन बरेच ठिकाणी काहीबाही खाता येतं, शेकोट्या पेटलेल्या असतात. एक प्रकारची जत्राच ही. हत्तीची सफारी पण आहे पण ती मात्र नको वाटली पाहायला, हत्ती थोड्याच अंतरात लोकांना घेवुन फिरत होता. जादुगर सुद्धा ज्या पद्धतीने कबुतरांना हाताळत होता ते पाहुन वाईट वाटले पण बाकी अनुभव अफलातून होता. तिथल्या कलाकारांनी पैशाची डिमांड केली तर पैसे न देता तक्रार करा असे फलक लिहिले आहेत पण तरीही ते लोक पैसे मागतात आणि लोकही देतात. सर्वात शेवटी राजस्थानी थाली जेवायला मिळते. ती मात्र पुण्यातील चोखीदानीच्या थाळी सारखी नव्हती. बाजरीचा खिचडी, काही दुकाने आहेत त्यात राजस्थानी कलाकुसर असलेले कपडे, रजया, पर्स, झुंबरे , लाकडी शोपीस असे बरेच काही खरेदी करता येते. पॅाटरी, माघावर विणकाम हे सर्व स्वतः अनुभवता येतं एकंदर मजेचा दिवस.
पुढच्या भागात अमेर फोर्ट, नहार फोर्ट याविषयी ..









.jpeg)






.jpeg)

.jpeg)



फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत.
अच्छा 👍
कन्नप्पा नयनार खुप शोधला पण सापडलाच नाही. मी कोणाला तरी विचारायला पाहिजे होते.