Thursday, April 30, 2020

रामायणाच्या पाऊलखुणा....

चार पाच महिन्यांपूर्वी जेव्हा यावर्षीची वार्षिक कौटुंबिक सहल कुठे न्यायची असा विचार करत होतो, तेव्हा अचानक दहा वर्षांपूर्वी टाटा मध्ये असताना निखिलने सुचवलेल्या वायनाड ची आठवण झाली. लग्नाआधी माझ्या केरळ वाऱ्या दोन तीन झाल्या होत्या पण लग्नानंतर एकही नाही. त्यामुळे केरळ आणि कर्नाटक अशी मोपल्यांच्या बंडाची सुरुवात जिथे झाली ते वायनाड- काबिनी - कुर्ग - मडीकेरी-म्हैसूर- बंगलोर अशी भरगच्च ट्रीप ठरवली.

खरेतर वायनाड हे तसे फार प्रसिद्ध नाही. पण नेमके राहूल गांधींनी अमेठी बरोबर हा मतदारसंघ निवडला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. आमच्या ट्रीपची सुरुवात आम्ही पनवेल- कोझीकोड (कालिकत) अशा रेल्वे प्रवासाने केली. त्यामुळे रात्रभर रेल्वेचा प्रवास आणि नंतर तीन तास रोडचा प्रवास करुन मुले वैतागली होती. त्यामुळे उरलेला पहिला दिवस हा आराम करण्यातच घालवला. त्यावेळी काय काय पहायचे याचा अभ्यास करताना एकदम सीतादेवी - लव कुश मंदिराने लक्ष वेधून घेतले. ड्रायव्हरला विचारले तर त्याला काहीच माहिती नाही. पण त्याला दाखवल्यावर आणि गुगळे मॅप्स वर बघितल्यावर सकाळी लवकर यायला तो यायला तयार झाला. सकाळी म्हणजे पहाटेच कारण हे एकदम वेगळ्या वाटेवर आणि तासाभराच्या अंतरावर असल्याने, उशिरा गेलो तर आमचे दिवसभराचे गणित चुकणार होते. पण लव- कुश मंदिर हे वाचूनच मी बाकी कुठे नाही गेलो तरी चालेल पण इथे जायचेच हे ठरवून टाकले.

लवकर झोपलेलो असल्याने पहाटे पाचलाच जाग आली. त्यामुळे आमच्या दोघांचे आवरुन आणि मुलांना झोपेतच उचलून, आम्ही वायनाड- पालुपल्ली प्रवासाला सुरुवात केली. बोलता बोलता ड्रायव्हरही म्हणाला की मी पाचशे वेळा वायनाडला आलो असेन पण पालुपल्लीला आणि पर्यायाने या मंदिरात पहिल्यांदाच चाललोय.

तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. फोटोत बघितलेल्या मंदिरामुळे माझी उत्सुकता फारच वाढली होती. आणि मंदिराच्या त्या पहिल्या प्रत्यक्ष दर्शनाने तर आपण इकडे यायचा अगदी योग्य निर्णय घेतला याचे समाधान वाटले. सकाळचे रम्य वातावरण आणि ते अप्रतिम असे मंदिर यामुळे आमच्या ट्रीपची सर्वार्थाने मस्त सुरुवात झाली होती.

मंदिरात आवारात प्रवेश केल्यावर समोरच सीतादेवीचे मंदिर आहे. सकाळच्या आरतीची वेळ असल्याने मंदिरातल्या सगळ्या समया पेटवलेल्या होत्या. त्याची अद्भूत अशी आरास डोळ्यांचे पारणे फेडत होती. त्या प्रकाशात सीतामाईही अगदी उजळून निघाली होती. त्याच्या शेजारीच लव- कुशांचे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर आहे. त्यांच्या मूर्ती अगदी वेगळ्या अशा होत्या. त्याबरोबरच गणपती, नागदेवता, शिव, अय्यप्पा आणि सुब्रमण्यम यांचीही छोटी छोटी मंदिरे त्या आवारात आहेत.

तिथून बाहेर पडताना, भिंतीवर लिहिलेल्या स्थानमहात्म्याने एकदम रोमांचित झालो. आणि तिथेच काही लिखित माहिती मिळेल का असे विचारले. तिथे एक छोटेसे दहा पानी मल्याळम भाषेतील माहितीपुस्तिका मिळाली. नशिबाने शेवटी एक पान इंग्रजी मध्ये होते आणि त्यामुळे या पवित्र स्थानाची बऱ्यापैकी माहिती कळली.

ही जागा म्हणजे रामायणातील वाल्मिकी आश्रम. इथेच सीतेने लव-कुशाला जन्म दिला. आणि अश्वमेध यज्ञासाठी प्रभू श्रीरामांनी सोडलेल्या अश्वाला या दोघांनी इथेच अडवले होते. पूर्वीच्या काळी हा सगळा परिसर जवळपास पंधरा हजार एकरांचा होता. पण आता मात्र फारच थोडा परिसर उरला आहे. ही जी मंदिरे होती त्यालाच वाल्मिकी आश्रम किंवा पूर्व स्थानम् असे म्हणतात. भिंतीवर लिहिलेल्या चार ओळींमध्ये शेवटची ओळ होती की इथूनच जवळ असलेल्या मूलस्थानम् ला भेट दिल्याशिवाय तुमची यात्रा आणि दर्शन पूर्ण होणार नाही. आलोच आहोत तर जाऊच या म्हणून मग गाडी तिकडे वळवली.

पाच मिनिटांवर असलेले ते ठिकाण म्हणजे रामायणातील एक अद्भूत ठिकाण आहे. कारण संपूर्ण रामायणातील ही एकमेव जागा आहे जिथे श्रीराम, सीतामाता, लव-कुश, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वाल्मिकी ऋषी, हनुमान आणि इतर देवता यांची भेट झाली. पूर्वी वाल्मिकी आश्रमाचाच भाग असलेल्या या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि ती धरणीमातेला शरण गेली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी रामाने तिचे केस पकडले पण त्याच्या हातात फक्त केस राहून सीता मात्र भूगर्भाच्या उदरात गेली. त्यामुळे तिथे केस नसलेल्या सीतेच्या मूर्तीची पूजा करतात.

हे सगळे माझ्यासाठी अद्भुतच होते. कुणीही कितीही प्रयत्न केला तरी आपली ही पुरातन संस्कृती आणि त्यातील दैवते ही वेगवेगळ्या रुपात आपल्यासमोर येतच रहातात. अगदी अनपेक्षितपणे हा पुरातन सांस्कृतिक ठेवा आमच्या समोर आला आणि आमच्या वार्षिक सहलीची सुरुवात ही रामायणमय झाली. पुढच्या वेळी कुणी आले तर मी याठिकाणी मी नक्की घेऊन येणार असे आमच्या ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून तर या संपूर्ण सहलीचे फळ पहिल्या तीन तासातच मिळाले. तुम्हीही कुणी वायनाडला आलात तर या ठिकाणी अगदी न चुकता भेट द्या.

हृषीकेश कापरे
०३.०६.१९

कोयनानगर परिसराचे पर्यटन

      ब्रिटीशांनी विकसित केलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सध्या खुपच लोकप्रिय झाले. मुंबई, पुणे येथून येणे सोयीचे असल्याने महाबळेश्वर गर्दीने ओसंडून जाउ लागले आणि अर्थातच ईथल्या सर्व सोयींचे दर गगनाला भिडले आणि महाबळेश्वर सर्वसामान्यांना आवाक्यात राहीले नाही. शिवाय पर्यावरणाच्या र्‍हासाने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने नवे महाबळेश्वर वसविण्याची संकल्पना पुढे आली. आणि कोयनानगर हे नाव आणि परिसर यासाठी आदर्श असल्याचे लक्षात आले. जे कोयनानगर एकेकाळी फक्त कोयना धरणामुळे आणि १९६७ ला झालेल्या भुकंपामुळे सर्वाना ओळखीचे होते, ते आता नव्याने कात टाकून पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. या कोयनानगर परिसराची आज भटकंती करायची आहे.
        कसे याल?
    १) पुण्यावरुन यायचे असल्यास, पुणे-सातारा- उंब्रज- पाट्णमार्गे  १८२ कि.मी.
    २) मुंबई-चिपळूण-कोयनानगर  288 KM

    पुणे-मुंबईवरुन कोयनानगरला जर पुणे-बेंगळूरु महामार्गाने येत असाल, तर वाटेत थांबण्यासारखी ठिकाणे
    १)  जोशी वाडेवाले (एनएच 4) ->  कात्रज बोगला पार केल्यावरआपल्या उजव्या बाजूला दिसते. वडापाव, मिसळपाव, चहा / कॉफी, वडा सांबार इत्यादी चवदार खाद्यपदार्थ.
    २)  हॉटेल नटराज (एनएच 4)) -> खेड शिवापूरजवळ (सातार्‍याकडे जाताना डावीकडे). दक्षिण भारतीय नाश्त्यासाठी चांगली जागा. उडपी व्यवस्थापन.
    ३)  विठ्ठल कामथ रेस्टॉरंट (एनएच 4)) - शिरवळच्या आधी किकवी गावात आपल्या डावीकडे “कंपनी ऑपरेट एचपी पेट्रोल पंप” च्या आवारात. चांगले अन्न, भरपूर जागा आणि स्वच्छ शौचालये. आपल्याला फक्त शुद्ध व्हेज मिळेल. दक्षिण भारतीय / पंजाबी / चीनी खाद्य. पेट्रोलही पुणे शहरापेक्षा स्वस्त.
    ४) माईलस्टोन फूड प्लाझा (एनएच 4) - सातारा आणि उंब्रज दरम्यान (सातारा / कराडच्या दिशेने जाताना डावीकडे). हे पुणे - नगर रोडवरील स्माईलस्टोन फूड प्लाझासारखेच आहे.
    ५) नवमी फूड प्लाझा (एनएच 4) - उंब्रजला पोहोचण्यापूर्वी (सातार्‍यात जाताना डावीकडे). उडपी व्यवस्थापन.
    मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने चिपळूणकडे येताना-
     १) संगमेश्वर जवळ एनटेल ड्राईव्ह इन (एनएच 17)
    २)  गोवा महामार्गावर तुम्हाला विठ्ठल कामथ रेस्टॉरंट प्रत्येक 100 किमी नंतर दिसेल.
    कोयनानगर मधील पर्यटन स्थळ.......
    १. कोयना धरण
    २. नेहरू उद्यान
    ३. ओझरडे धबधबा
    ४. जंगली जयगड
    ५. पॅगोडा, हुंबरळी
    ६. प.पु. गगनगिरी महाराज आश्रम, ढाणकल
    ७. विट्ठल रुक्मिणी मंदिर, नवजा
    ८. राम घळ
    ९. बोटिंग (जलाशयातिल नौकाविहार)
    १०. घाटमाथा
    ११. भैरवगड
    १२. वासोटा किल्ला
     कोयनानगर परिसराच्या पर्यटन स्थळांचा नकाशा

    कोयना धरणाविषयी महत्त्वाचे
         निसर्गसौंदर्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोयना नदीचे उगमस्थान महाबळेश्वरपासून ६४ किलोमीटर अंतरावर कोयानानदीवर देशमुखवाडी येथे कोयना धरण बांधण्यात आले. सन १९१० ते १९१५ या काळात ब्रिटीश सरकारची संकल्पना असलेले कोयना धरण स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली १९६२ साली पूर्णत्वास आले . याच कोयना धरणातील अफाट जलसाठ्यावर चार टप्प्यात भव्य वीजनिर्मिती साकारून २००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली.
         हि वीज महाराष्ट्रासह शेजारील राज्यात वापरली जाते. त्याचबरोबर कोयना धरणातील पाण्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यातील शेतजमीन सिंचनाखाली आणून शेती सुजलाम-सुफलाम करण्यात आली आहे. म्हणूनच कोयना धरणाला महाराष्ट्राचे भूषण व भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. 
    कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प १९६२ मध्ये पूर्णत्वास आला. १०५ टीएमसी पाणीसाठा क्षमता व १९२० मेगावॅट वीजनिर्मितीबरोबर सिंचनाची जबाबदारी आहे. कोयना नदीवर कोयनानगर येथे हे धरण उभारलेले आहे. त्या भागातील सरासरी वार्षिक पाऊस ५,००० मिलिमीटरचा आहे. धरणाची लांबी ८०७.७२ मीटर आहे. उंची १०३.०२ मीटर आहे. त्याचे बांधकाम १९५४ ते १९६७ या कालावधीत झाले आहे. सुमारे हजारो हेक्‍टरचे क्षेत्र ओलिताखाली आहे. कोयनेच्या जलाशयाला शिवसागर जलाशय नावाने संबोधले जाते. कोयनानगर ही कोयना धरणाच्या कामासाठी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांना राहण्यासाठी तयार झालेली  एक वसाहत  आहे.
     नेहरू उद्यानाबद्दल थोड........

         कोयना धरणाच्या भूमी पुजनासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ज्या भूमीला पाय लागले त्याचीच आठवण जपण्यासाठी कोयनानगर येथे भव्य नेहरू उद्यान उभारण्यात आले आहे. कोयनानगर पासून साधारण ३ कि. मी. च्या अंतरावर नवजाच्या दिशेला हे उद्यान बनविण्यात आले आहे. यामध्ये पंडितजींच्या पंचतत्वांची जाणीव करून देणारा पंचधारा घुमट देखील आहे. या उद्यानात विविध प्रकारची झाडे, वेली आणि मनमोहक फुले पर्यटकांच आकर्षण आहेत.लहान मुलाना खेळण्याकारिता येथे अद्यावत खेळणी देखिल आहेत, ज्यावर दिवसभर मुले रमून जातात. या उद्यानातुन कोयना धरणाची मागची बाजु पहावयास मिळते. नेहरू उद्यानात कोयना धरण, कोयना वीजनिर्मिती  प्रकल्पाची माहिती देणारी एक छानशी चित्रफीत सुद्धा दाखवन्यात येते त्यासाठी यशोगाथा केंद्र बनवलेले आहे. दरवर्षी बाल जयंतीच्या निमित्ताने येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रद्धांजली  वाहन्यात येते.
        अलिकडेच या उद्यानाजवळ एका नवीन आकर्षणाची भर पडली आहे.उद्यानाच्या शेजारी असणार्‍या डोंगरामध्ये शिल्पमुद्रा तयार झाली असून ती पंडित नेहरू यांच्या चेहर्‍याशी मिळती जुळती आहे

     नेमका नेहरु उद्यानाजवळच निसर्गाचाही हा चमत्कार दिसावा हे सर्वांसाठी आश्‍चर्य व उत्सुकतेचा विषय ठरला आहे. आजवर कोयनेला धरण, वीज निर्मिती प्रकल्प, नेहरू गार्डन, पॅगोडा, पावसाळ्यातील ओझर्डेसह अन्य धबधबे यामुळे पर्यटक येत असतात. आता डोंगरातील शिल्प मुद्रा हे येथील नवे आकर्षण आहे.

    ओझर्डे धबधबा

     पावसाळ्यात कोयना पर्यटन म्हटलं की, पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो सुमारे ३५० मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा. खरेतर सध्या सह््याद्रीच्या कुशीत वसलेला कोयनानगरचा परिसर हिरवीगार शाल पांघरू लागला आहे. कोयनेतून केवळ १० किलोमीटरचे अंतर कापत असताना गर्द हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष, वळणावळणाचे रस्ते, शेजारीज पसरलेला शिवसागर जलाशय, जमिनीपर्यंत टेकलेल्या छपरांची घरे, भर पावसात शेतामध्ये भाताच्या रोपांची लागण करत असणाºया महिलांचा समूह, बाजूलाच वाहणारी मातीच्या रंगाची कोयना नदी, छोटीछोटी दुकाने पाहत-पाहत आपण ओझर्डे धबधब्याशेजारी पोहोचतो.  पाबळनाला धबधबा पाहिल्यानंतर थेट ओझर्डे धबधब्याकडे आपण प्रवास करतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोठमोठ्या दगडी शिळा पाण्याच्या तडाख्याने गुळगुळीत झालेल्या निदर्शनास येतात. तसेच प्रवेशद्वारापासून कोसळणारा अन् फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर पर्यटक वेगाने पायºया चढायला लागतो. जंगलातून चढ चढत असताना एका बाजूला फेसाळणारे पाणी, त्याचा विशिष्ठ आवाज, झाडांच्या खोडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि त्यावर आलेली हिरवीगार शेवाळे, जाडजूड वेली, मध्येच लोखंडी कड्ड्यावर चिंब भिजल्यामुळे कुडकुडत असणारा माकडांच्या समूह, मोठ्या धबधब्याला येऊन मिळणारे छोटेछोटे झरे, त्यातून पारदर्शक पाण्यातून दिसणारा गुळगुळीत खडक, झाडांच्या पानांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, पाहत-पाहत जवळपास ४०० पायºया चढून आपण कधी धबधब्याजवळ पोहोचलो लक्षात येत नाही. जेव्हा विशालकाय धबधब्यातून जवळपास ९०० फूटावरून कोसळणारे पाणी पाहताच वाटायला लागते की, निसर्ग अफलातून आहे. कारण, पाण्याचा वेग, बाजूला पाऊस नसतानाही केवळ धबधब्याच्या पाण्याने उडणारे तुषार पर्यटकांनी चिंब भिजवून टाकतात. पूर्ण परिसर पाण्याच्या तुषारांनी भरलेला असतो. अर्थात ईथे येताना थोडी काळजी घेतली पाहीजे. पाण्याचा जोर असेल तेव्हा थेट प्रवाहात न उतरणे, पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात जळवा असतात, तेव्हा जवळ आगपेटी बाळगून जळवा लागल्या तर चटका देता येईल किंवा हळद हा देखील उपाय आहे. शिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात सरिसृप आहेत, याचेसुध्दा भान ठेवायला हवे. या धबधब्याच्या पाण्याचा सुध्दा वीज निर्मिताला उपयोग करुन पाचवा टप्पा निर्माण करणे, प्रस्तावित आहे.

    कुंभार्ली घाट
    कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे.
    जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.
     घाटमाथा येथील हॉटेल सुस्वाद

         प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.

    चांदोली व कोयना अभयारण्य:-

         जागतिक नैसर्गिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या क्षेत्राला सर्वांगसुंदर निसर्ग लाभला आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदिर, जंगली भ्रमंती वाटा या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत आहेत. पर्यटकांसह निसर्गप्रेमींसाठी व्याघ्र प्रकल्पातील सुविधा त्या भागातील नैसर्गिक सुविधांचा आनंद लुटण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री म्हणजे पर्वतरांगांचा प्रदेश. तेथेच कोयना राष्ट्रीय व चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दोन्हीमध्ये सह्यादी व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्यादी व्याघ्र प्रकल्प अशी रचना झाली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा या भागात ओघ वाढला आहे. चांदोली आणि कोयनाचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे अधिक संरक्षित आहे. सह्याद्री म्हणजे विदर्भाबाहेरील मान्यता मिळालेला राज्यातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट, ताडोबा, अंधारी-पेंच प्रकल्पांनंतरचा सह्याद्री चौथा प्रकल्प आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे ७५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होतो आहे. या भागातील वाघांची संख्या लक्षात घेऊन तेथे व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यासाठी शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरालाही सामावून घेतले आहे. वाघांबरोबरच तेथे असणाऱ्या गवा, चितळ, सांबर व हरिण प्राण्यांनाही संरक्षण मिळाले आहे. २००७ च्या वन्यप्राण्यांच्या गणनेत कोल्हापूर विभागातील कोयनेत दोन, चांदोलीत तीन, तर राधानगरी परिसरात चार असे एकूण नऊ वाघ आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या चाळीसवर होती, ती आता वाढत जाऊन ७५ पर्यंत पोचल्याची नोंद आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. त्यामुळे येथे पर्यटनासही चांगला वाव मिळाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच निरोगी श्वासही मिळतो. व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे व्याघ्र प्रकल्पाचे स्वरूप आहे. जंगलात जवळपास ४५०० प्रजातींच्या वनस्पती असल्याचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणलोट क्षेत्र आहेत. झरे, धबधबे आहेत. नद्यांचा उगम येथूनच आहे. नद्यांवर धरणाची निर्मिती याच भागात आहे.
    चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौरस किलोमीटर व कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौरस किलोमीटरचे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित आहे. वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरिण, बिबटे प्राणीही येथे आहेत. त्यातील अनेक प्राणी दिसतातही. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये दुर्मीळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. कोयना प्रकल्पासह आठ मध्यम पाटबंधारे प्रकल्प, आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनऊर्जा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटणच्या पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाबरोबरच पवनऊर्जा प्रकल्पाने पाटण तालुक्‍याला जगाच्या नकाशावर नेले. वनकुसवडे, सडावाघापूर व वाल्मीक पठारावर जेथे कुसळही उगवत नव्हते अशा जांभ्या पठारावर देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी कोट्यावधींची गुंतवणूक करून एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रकल्पाने दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे पोचले व ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळाली. त्याचाही पर्यटनासाठी विशेष उपयोग झाला आहे.
        व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला आंबा म्हणजेच विशाळगड आहे. दोन्ही ऐतिहासिक किल्ल्यांच्या मधे साकारणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला निसर्गाची मोठी देणगीच मिळालेली आहे. त्याचा विचार करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्या भागाची जागतिक वारसास्थळ म्हणून घोषणा झाल्यामुळे या भागातील पर्यटन विकासाला गती आली. व्याघ्र प्रकल्पातील धबधब्यापासून किल्ल्यांवरील पर्यटनास चालना देणाऱ्या अनेक गोष्टी येथे विकसित होत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यासकांची गर्दी असते. पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेथे नेहमीच येतात. इतर वेळी मृतप्राय झालेली पठारे पावसाळ्यात जिवंत होतात, हेच भागाचे वैशिष्ट्य आहे. पवनचक्‍क्‍यांचा तालुका म्हणूनही परिसराची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्‍क्‍यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. तो भागही पर्यटनाच्या सुविधेत आणला गेला आहे. त्याशिवाय खासगी कंपन्यांकडूनही येथे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाणेल येथे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था खासगी संस्थेकडून केली आहे.
          मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोयना शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्त्वाची दोन धरण आहेत. त्याच्या जलाशयात बोटिंगची सुविधा करणार आहेत. ते काम सुरत यंत्रणेच्या परवानगीनंतर सुरू होणार आहे.
        व्याघ्र प्रकल्पात काय पहाल
    किल्ले : महिमागड (रघुवीर घाटात), वासोटा, पालीचा किल्ला, जंगली जयगड, भैरवगड, प्रचितीगड.
    डोंगरावरील मंदिरे : उत्तरेश्वर, पर्वत, चकदेव, नागेश्वर, उदगीर
    धबधबे : ओझर्डे धबधबा, कंदार डोह
    जंगल भ्रमंती वाटा : मेट इंदोली ते वासोटा, नवजा ते जंगली जयगड, कोठावळे ते भैरवनगड, पानेरी ते पांढरपाणी, झोळंबीचा सडा, खुंदलापूर ते झोळंबी, चांदोली ते धरण निवळे.

    आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

    पाटण तालुका म्हंटल कि निसर्ग सौंदर्याचे नवे दालनच पर्यटकांना डोळ्यासमोर दिसू लागले आहे. अफाट पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा भव्य पवनऊर्जा प्रकल्प निसर्गाच्या उंच शिखरावर डोलाने आपली पाती फिरवत उभा आहे. कोणतेही पिक अथवा गवत न उगवणाऱ्या पठारावरील सरासरी १ हजार एकर जमिनीमध्ये २ हजार पवनचक्कीची पाती , १२५० कि.व‌ॅट क्षमतेच्या वाऱ्याच्या जोरावर फिरत असून यापासून १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे . या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी सहभाग घेतला असून हजारो हेक्टर परिसरातील डोंगर कपारीत आदिवाशी जीवन जगणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. पवनऊर्जा कंपनीच्या माध्यमातून येथे दळणवळणाच्या सोयीसह येथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते. पाटणमधून सहज नजरेस पडणारा पवनऊर्जा प्रकल्प पाटणपासून काही अंतरावर आहे. एकदा या प्रकल्पाच्या सानिध्यात गेले कि पाचगणीच्या टेबललँडलाही मागे टाकणाऱ्या या वनकुसवडे पठारावरून सह्याद्री पर्वताच्या अफार पसरलेल्या पर्वतरांगांसह शिवसागर जलाशयाचा नजराना पर्यटकांच्या नजरेस येतो . तर पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय व सूर्यास्त पाहताना खरोखरच नवीन काही तरी पाहिल्याचा आनंद येथे जाणवतो .प्रदूषण मुक्त असणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पाने जागतिक पर्यावरणामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
     सडावाघापूर आणि वनकुसवडे 
    पाटण तालुक्यातील दोन महत्त्वाचे आणि आशिया खंडात प्रसिद्ध असणारे विज प्रकल्प आहेत. एक आहे कोयनेचा भूमिगत विज प्रकल्प आणि दुसरा आहे वनकुसवडेचा पवनऊर्जा प्रकल्प. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पश्चिम-उत्तर सह््याद्री पर्वताच्या वनकुसवडे पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर सडावाघापूर येथेही पवनचक्कीचे जाळे मोठ्या प्रमाणाच विणले आहे. पवनचक्की भलेमोठे फिरणारे पाते जवळून पाहताना काळजात धस्स होते. १ हजार एकरमध्ये दोन हजार पवनचक्कीची पाती १२५० कि.वॅटच्या क्षमतेने वाºयाच्या जोरावर फिरतात. यापासून १००० मेगावॅट विजनिर्मिती होत आहे. पठारावर उंच पण, जमिनीला टेकतील अशा छपरांची घरे आपल्याला पाहयला मिळतात. दुरून ही घरे छोटी आणि खुजी दिसत असली तरी एखाद्याा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घराचा आवाका आतून खूप मोठा असल्याचे लक्षात येते. घरामध्ये सुमारे १० जनावरे बांधली जातील इतका मोठा गोठा, त्याच्या सहा-सात खोल्या असतात. तसेच धान्य ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची जमिनीमध्ये जागा तयार केलेली असते. पवनऊर्जा प्रकल्पामुळे या गावांमध्ये हळुहळु विकास होत आहे. या दोन्ही डोंगरावरून समोर पाहिले असता पाटण शहराचे विहंगम चित्र डोळ्यांसमोर दिसते. वळवळणाचे मार्ग कापत वाहत जाणाºया केरा व कोयना या नद्याा, तसेच त्यांचा संगम, चोहो बाजूंनी पसरलेला सह््याद्री, अवघड असणारा घाटरस्ता, वेगाने वाहणारे वारे, परिसरात पसलेली लाल माती, छोटीछोटी काटेरी करवंदांची झाडे, प्रचंड मोठी दरी, दरीमध्ये वसलेली गावे आदी ठिकाणी सुखावून जाणारी आहेत. पवनचक्कीच्या पात्याआड सुर्योय किंवा सुर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. तसेच पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी आणि डोंगरमाथ्यावर प्रचंड वेगात वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी उलटे धबधबे पाहायला मिळतात.

    सुंदरगड ( घेरादातेगड )

    तलवारीचा आकार असेलेली विहीर घेरादातेगड पाटणच्या वायव्येस केवळ ३ मैलावर सह्याद्रीच्या उंच शिखरावर आहे. याला दुसरे नाव गंतगिरी व सुंदरगड असेही म्हटले जाते. किल्ल्यावर जाण्यासाठी जाईचीवाडी वनकुसवडे मार्गे वाहनाने १४ कि.मी. अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते . किल्ल्याच्या पायथ्यालाच निसर्गरम्य परिसरात पाटणचे ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदिर आहे. किल्ल्यावरील प्रमुख अवशेष म्हणजे भव्य तलवारीचा आकार असलेली खडकातील विहीर तसेच महादेव , गणपती आणि हनुमानाचे मंदिर हे होय . किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली विहीर मूळ आयताकृती आहे. पण नंतर तिला मुठीसह तलवारीचा आकार दिला आहे . विहिरीच्या पायथ्याच्या बाजूने अखंड खडकात खोदलेल्या एकूण ४१ पायऱ्या आहेत . विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूस महादेवाचे मंदिर खोदले असून त्याचा आकार सुमारे ८ फुट लांब , ७ फुट रुंद व ६ फुट उंच आहे. विहिरीतील पाण्याची खोली किती हे सांगता येत नाही. तलवार विहिरीच्या जवळच खडकात खोडलेले गणपती व मारुतीचे मंदिर आहे.मंदिर पूर्ण उघडे असून त्याच्यावर आच्छादन नाही . खडकात चौकोनी आकाराच्या खोदकामात उत्तर भिंतीवर दक्षिणाभिमुख गणपती व पूर्व भिंतीवर पश्चिमाभिमुख मारुती अश्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या पश्चिम बाजूला दगडात कोरलेली कमान व भुयारी मार्ग आहेत . येथील वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदय होत असताना सूर्यकिरण गणपतीवर येते . तर सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्याची किरणे मारुतीवर येत असतात. अशा रचनेत खोदलेले हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्पकलाकारांची बौद्धिकता जाणवून देते. विहिरीच्या उत्तरेस ५ टाक्या बांधकाम खोदलेल्या अवस्थेत आढळतात. येथे घोड्यांचा तबेला असावा अथवा धान्याचे कोठार असावे असा अंदाज व्यक्त केला जातो . निसर्गरम्य परिसरात असलेल्या या किल्ल्यावरून कोयनानदीचे नागमोडी आकाराचे विहिंगमय दृश्य दिसते. याशिवाय भैरवगड , किल्लेमोरगिरी , पवनचक्की प्रकल्प , या परिसरात पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगा यांचे सहज दर्शन होत असून किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त हे सुद्धा न्याहाळता येतात. 

    Reverse WaterFall - रिव्हर्स धबधबा

    रिव्हर्स धबधबा पाटण तालुक्यातील सडावाघापूर पठारावर पावसाळ्यामध्ये उंच कड्यावरून फेसाळत पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उलट्या दिशेने येत असल्याने अनेक रिव्हर्स धबधबे येथे पहायला मिळतात.

    गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची हि गर्दी होते.
    तारळे- पाटण मार्गावर सुमारे १४ किलोमीटरवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. जुलै व ऑगस्ट महिने सडावाघापूर पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास निर्माण करणारे असते. सुटीच्या दिवशी शेकडो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात. पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते; परंतु वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. कड्यावरून खाली पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे शंभर फुटापर्यंत उलटे पठारावर फेकले जाते. दरीला जवळ करणारे धबधबे पाहण्यापेक्षा हा उलटा धबधबा पाहण्यास अनेक जण पसंती देतात.
    कसे जाल आणि काय काळजी घ्याल...
    साताऱ्याकडून आल्यास सातारा- नागठाणे- तारळे- सडावाघापूर, तर कऱ्हाडकडून कऱ्हाड- पाटण- सडावाघापूर किंवा उंब्रजकडून उंब्रज- चाफळ- दाढोली- सडावाघापूर. तारळेपासून १४ किलोमीटर अंतर आहे. तारळे- पाटण बस आहे; पण स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. येथे हॉटेलची सोय नाही, तसेच पॉइंटकडे जाण्यासाठी दिशादर्शक नसल्याने गोंधळ उडतो. कड्याच्या बाजूस कोणतीही सुरक्षिततेचे साधन नसल्याने अती कड्याजवळ जाणे धोक्‍याचे ठरू शकते.
     के.टू.पाँईट ( काठी अवसरी )
    हिमालय पर्वतासारखे पसरलेले काठी अवसरी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगा , यामधून वाकडे-तिकडे साद घालणारे कोयना धरण , शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी , या पाण्यात सह्याद्री पर्वतावर हिरवेगार डोलणारे कोयना अभयारण्याचे प्रतिबिंब म्हणजे हिमालय पर्वतातील काश्मिरच होय. काठी अवसरी के.टू. पाँईटकडे जाताना सह्याद्री पर्वतावर पसरलेला आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्पाच्या पंख्यांचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष घोंगावणारा वारा येथे अनुभवता येतो .
     के.टू. पाँईटवरून शिवसागर जालाशयाबरोबर दिसणारा हिरव्यागार घनदाट जंगलातील निसर्गरम्य परिसरातील डोंगरामागे सायंकाळच्या वेळेला लपणारा सूर्य पाहताना स्वर्गाहूनही सुंदर हि भूमी वाटल्याशिवाय राहणार नाही. या के.टू. पाँईटवरून शिवसागर जलाशयापर्यंत पर्यटकांना उतरण्यासाठी रोपवे साकारण्याची संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आहे. येथून पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने तापोळावरून महाबळेश्वरला जाता येणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस बांधण्यात आले असून के.टू. पाँईट पाटणपासून ३० कि.मी. अंतरावर तर कोयनानगरपासून लाँचने १२ कि.मी. अंतरावर येते . 

    हुंबरळी पॅगोडा

    कोयनानगरपासून केवळ २ कि.मी.अंतरावर उंच ठिकाणी हुंबरळी येथे हा पॅगोडा आहे .पॅगोडापासून कोयना धरणाचा विलोभणीय ठेवा पर्यटकांना नजरेस येतो .
    .त्यातच आजुबाजूच्या हिरव्या घनदाट जंगलांनी कोयना धरणाचे दृश्य आणखीनच विलोभनीय झाले आहे. प्यागोडाजवळच महाराष्ट्र टूरिझमचे कोयना लेक रिसोर्ट ,विन्डशाली रिसोर्ट, खास पर्यटकांसाठीच आहेत . 

    रामबाण तीर्थक्षेत्र

    निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत . हे पर्यटकांचे भाग्याच म्हणावे लागेल . ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले . चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली . यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला . या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत नव्हता . अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला . त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला . सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली . अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते. आजही हा रामबाण तीर्थ असणारा पवित्र दगड नवजाच्या जंगलात पर्यटकांना पहावयास मिळतो. याठिकाणी रामनवमीला गावकरी उत्सव साजरा करतात.या उंच दगडात बाणाच्या प्रहराप्रमाणे आकार असून या बाणातून सहज ग्लासने पाणी काढता येते . येथील वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या अवतीभोवती कोणताही पाण्यासाठी पाझर नाही , अथवा पाण्याच्या समांतर रेषेवर जमिनीचा आधार नाही. उभ्या असलेल्या दगडावर जमिनीपासून ६ फुटाच्या अंतरावर या दगडात बारा महिने थंडगार पाणी असते . हे पाणी येथे येणारे पर्यटक व रामभक्त भक्तिभावाने रामबाण तीर्थ म्हणून प्राशन करतात. 

    हेळवाकची रामघळ :-

    हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
    Bhairavgad 7
    एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
    Bhairavgad 8
    या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
    Bhairavgad 9
    हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
    Bhairavgad 10
    रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
     कोयनानगर येथे रहाण्याची सोयः-
    १) कोयना लेक रिसॉर्ट:-  कराड शहरापासून सुमारे  55 कि.मी. अंतरावर असलेल्या आणि ज्यांना नियमित रीतीच्या कामापासून रगाड्यापासून दूर होउन रीफ्रेश व्हायचे आहे त्याना कोयना लेक रिसॉर्ट हा उत्तम पर्याय आहे . कोयना लेक रिसॉर्टमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वातावरण मिळेल. कोयना लेक रिसॉर्टमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध आहे. कुटूंबासाठी योग्य सूट मिळेल. आपले मनोरंजन करण्याच्या बर्‍याच गोष्टी आहेत. आपण शेतात फिरू शकता आणि त्यांची लागवड होणारी पिके पाहू शकता, गोफणीने दगड फेकू शकता किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकत बसू शकता. कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प हे मुख्य आकर्षण आहे. कोयना लेक रिसॉर्ट हूंबर्ली (कोयनानगर) च्या टेकडीवर आहे आणि ती जागा समुद्रसपाटीपासून 3200 फूट आहे आणि सर्व ऋतूंमध्ये हवामान थंड,आणि सुखद असते. विशेषत: पौर्णिमेची रात्र असताना आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे.
        यात 1 बंगला, 2 फॅमिली स्वीट्स आणि सुमारे 20 कॉटेज (एसी किंवा नॉन एसी) आहेत आणि दर रू. - ९०० - २०००/-. हा पूर्वीचा एमटीडीसी रिसॉर्ट होता, आता तो सांगली येथील साठे एंटरप्रायजेसच्या खासगी फर्मकडून चालविला जातो.
    कोयना लेक रिसॉर्टकोयनागर. (जि. सातारा)
    एच.ओ. साठे एंटरप्रायजेस, सांगली
    फोनः - 0233-2374668 / 2381610
    फॅक्स: - 0233-2322957 / 2381610
    मोबाईल: - 9922112803
    मोबाईल: - 9850573452
    बुकिंगसाठी, भेट द्या - http://koynalakeresort.com/
    २) गुरसाळे रिसॉर्ट
    कोयना नगर हिल स्टेशन, हुब्राली, ता .: पाटण
    दूरध्वनी: 02372 284501
    बुकिंग कॉन्टॅक्टसाठी
    दूरध्वनी: 02164 226007, 226207, मॉब: 94220 39646, 94224 01907
    ३) हॉटेल श्रुती लेक व्ह्यू - 9421212933
    ४) निसर्ग यात्री, हुंबर्ली, कोयनागर (रमेश देसाई) मोबाइल: - 9420631366/9420462366/9423319066 

    Accommodation -

    Koyna Lake Resort 

    Located about 55kms away from City of Karad Spread over 6.5 acres and very scenic location, Koyana lake Resort provides a perfect family getaway for those who want refreshing holidays, away from their routine work. At Koyana lake Resort, you will find typical natural environment. Koyana lake Resort specializes itself in Vegetarian and non-vegetarian Food. Suites perfect for all family sizes. There are lots of things to entertain you. You can roam around on the farm and look at the crops that they grow, relax in hammocks or just sit listening to chirping music of birds. The major attraction is koyna dam & hydroelectric project. Koyana Lake Resort is situated on the hill top of Humabarli ( Koyananagar) and the site is 3200ft.above sea level and the weather is cool, misty and pleasant in all seasons. Especially, you should visit this place when there is full moon night.
    It has 1 Bungalow, 2 Family suites and around 20 cottages (AC or Non AC) and tariff is between Rs. 900 - 2000. It was erstwhile MTDC Resort, now managed by a Private Firm - Sathe Enterprises from Sangli.

    Koyna Lake ResortKoyna nagar. (Dist. Satara)
    H.O. Sathe Enterprises, Sangli
    Ph:- 0233-2374668 / 2381610
    Fax :- 0233-2322957 / 2381610
    Mob:- 9922112803
    Mob:- 9850573452
    For booking, visit - http://koynalakeresort.com/

    There are other small resorts/home stays available for stay enroute Koyna Nagar - Humbarli with decent accommodation and excellent views. 
    Koyana Nagar Hill Station, Hubrali,  Tal : Patan
    Tel : 02372 284501
    For Booking Contact
    Tel : 02164 226007, 226207, Mob : 94220 39646, 94224 01907
    Hotel Shrushti Lake view - 9421212933
    NISARG YATRI RESORT HUNBARALI KOYNANAGAR (RAMESH DESAI) MOBILE:- 9420631366/9420462366/9423319066 

    Sunday, April 26, 2020

    भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी भाग ८ ( रत्नागिरी ते राजापुर)

      या भागात रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षीण भागातील किनार्‍याने भटकंती करायची आहे.
    पावस आणि इतर पर्यटन स्थळांचा नकाशा
     भाट्ये किनारा : भाट्ये गावातील खाडीच्या जवळ असलेला हा किनारा त्याच नावाने ओळखला जातो. येथे समुद्राला काजळी नदी येऊन मिळते. या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते. समुद्रकिनारी सुरूबन आहे. फयान चक्रीवादळात त्याचे मोठे नुकसान झाले. हा किनारा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आहे. 
    रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात त्यांच्यासाठी भाट्ये बीच हा उत्तम पर्याय आहे.

        किनाऱ्याच्या टोकाला झरीविनायकाचं मंदिर आहे. येथील गोमुखातून वाहणाऱ्या झऱ्यापासून तळे तयार झाले आहे. हे तळे बारमाही पाण्याने भरलेले असते. यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. मंदिर खूप मोठे नाही पण जाता जाता दहा/पंधरा मिनिटे थांबून पाहण्यासारखे आहे.

    कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट

    'झरी विनायक' मंदिरानंतर येणारा वळणावळणाचा छोटासा घाट चढायचा कि भाट्ये बीचपासून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला एक प्रशस्थ रिसॉर्ट आपले लक्ष वेधून घेतो. हा आहे “कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट”. हा लक्झरी रिसॉर्ट समुद्राजवळील एका मोठ्या टेकडीवर बांधलेला आहे. 
     
    या रिसॉर्टच्या आवारात समुद्राकडे तोंड करून एक भली मोठी बोटीसारखी कलाकृती बनवलेली आहे. हि बोटीच्या आकाराची रचना टायटॅनिक पॉइंट म्हणून ओळखली जाते. 
    हा संपूर्ण परिसर कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट यांची खाजगी मालमत्ता असल्याने जर का आपण या हॉटेलमधे उतरलेले टूरिस्ट नसाल तर माणशी ५० रुपये मोजून या रिसॉर्टच्या आत जाण्यासाठी गेटपास मिळतो. पण हे मोजलेले ५० रुपये वाया जात नाहीत हे मात्र खरं.
          या टायटॅनिक पॉइंट नावाच्या सी-फेसिंग बोटीतून समोर अमाप सुंदर दृश दिसते. इतर कोणत्याही हॉटेल किंवा रिसॉर्ट मधून अरबी समुद्राचे एवढे सुंदर दृश्य बघायला मिळत नाही नाही. थोडक्यात सांगायचे तर १५० रुपये पूर्ण वसूल होतात असे म्हणायला हरकत नाही..
    पावस :
     पावस हे एक आध्यात्मिक केंद्र आहे. रत्नागिरीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर पावस हे निसर्गरम्य गाव आहे. श्री ज्ञानेश्र्वर महाराजांच्या नाथ परंपरेतील महापुरुष स्वामी स्वरुपानंद यांचे पावस हे जन्मगाव. येथेच स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत होऊन पावस हे आता तीर्थक्षेत्र बनले आहे. विष्णुपंत आणि रखमाबाई गोडबोले यांच्या पोटी स्वामींचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस तर पुढील शिक्षण रत्नागिरीला झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये सन १९१९ ला दाखल झाले. तिथे त्यांना आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण मिळाले. अठराव्या वर्षापासूनच ते महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. स्वामीजींनी महात्मा गांधीजींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामिल होऊन स्वावलंबन आणि राष्ट्रीय शिक्षण याला अनुसरुन पावस येथे शाळा काढली. ब्रिटीश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेताना त्यांनी येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगला. नंतर पुण्याचे गुरु बाबामहाराज वैद्य यांच्या कडून आध्यात्मिक कार्याची दीक्षा मिळाली आणि त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. पावसला येऊन त्यांनी कठोर तपश्चर्या केली. दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला आणि त्यांना स्वामी ही उपाधी मिळाली. “राम कृष्ण हरी” हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्यांना दिला.


     स्वामींजी १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधिस्त झाले. स्वामी स्वरूपानंदांनी जेथे संजीवन समाधी घेतली त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या स्मृतिमंदिराच्या तळाशी असलेल्या ध्यानगुंफेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे. मंदिरातील शांतता, पावित्र्य आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. स्वामींचे वास्तव्य असलेली ‘अनंत निवास’ ही इमारत समाधीजवळच आहे. १९३४ ते १९७४ पर्यंत स्वामीजींचे वास्तव्य येथे होते. समाधी मंदिराच्या शेजारी एका आवळीच्या झाडात काही वर्षांपूर्वीच एक स्वयंभू गणपती प्रकट झाला आहे ज्याला "आवळी गणेश" असे म्हणतात. मंदिर परिसर मोठा असून येथे भक्तनिवास व प्रसादाची सोय देखील आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे.    

         स्वामी स्वरूपानंदांनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी येथे समाधी घेतली. त्यांच्या ४० वर्षांच्या वास्तव्याने हे ठिकाण पवित्र झाले आहे. त्यांची समाधी व स्मृतिमंदिर येथे बांधण्यात आले आहे. समाधीमंदिराच्या शेजारी आवळीच्या एका झाडात स्वयंभू गणपती आहे. येथे भाविकांची सतत वर्दळ असते. रत्नागिरीत आलेला पर्यटक पावस व गणपतीपुळे येथे आल्याशिवाय जातच नाही. स्वामींच्या समाधीमंदिरात निवासाची व भोजनाची (मर्यादित) सोय आहे. रत्नागिरी एसटी स्टँडवरून पावस या मार्गावर दर तासाने बससेवा उपलब्ध आहे. वाटेत फिनोलेक्स कंपनीचा मोठा कारखाना आहे
     
      पावसमध्ये आढळला शिलालेख!
       
        तालुक्यातील पावस येथील श्री विश्‍वेश्‍वर मंदिराच्या दीपमाळेजवळ मंदिर जीर्णोद्धाराविषयीचा शिलालेख सापडला आहे. सन १७२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याबाबत यात उल्लेख आहे. हा शिलालेख पुण्यातील इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी वाचला असून, त्यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली.
                श्री विश्‍वेश्‍वर व श्री सोमेश्‍वर या दोन्ही मंदिरांची बांधणी सारखी आहे. काष्ठशिल्पे, दिशा, रचना यात साम्य असल्याने या मंदिरांचे जीर्णोद्धार एकाचवेळी झाले असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळच विश्‍वेश्‍वराचे मंदिर आहे. विश्‍वेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी-पोतदार यांनी केला, असा शिलालेखावर उल्लेख आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातला हा असावा, असे सांगून श्री. तेंडुलकर म्हणाले मंदिरात गेलो, तेव्हा मंदिराची बांधणी सारखी आढळली.
         काष्ठशिल्प सारखीच आहेत. विश्‍वेश्‍वर मंदिराच्यासमोर दीपमाळेजवळ एक शिलालेख भग्नावस्थेत आढळला. सचित्र पावस दर्शन पुस्तकात शिलालेखाचा फोटो दिला आहे; पण त्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यावेळी शिलालेख पाहिला, तो वाचता येत नव्हता. तो अभ्यास करून वाचला. अनेक ठिकाणी मंदिर परिसरात शिलालेख वाईट पद्धतीने पडलेले असतात. द्वारशिल्प व त्यातील महत्त्वाचे भाग रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
           दरम्यान, श्री. तेंडुलकर यांच्या ‘मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्‍वात’ या पुस्तकात ३५९ शिलालेखांचा समावेश आहे. यात रत्नागिरीचे ७ शिलालेख आहेत. मराठा सरदारांनी केलेल्या बांधकामाची माहिती पोहोचवण्यासाठी अभ्यासाची गरज तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
    शिलालेख काय?
          शके १६४७ विश्‍वावसू नाम संवत्सरे, यावर्षी विश्‍वेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी पोतदार यांनी केला, असा सात ओळीतील मजकूर या शिलालेखावर कोरला आहे. सोमेश्‍वराचा शिलालेख उपलब्ध नाहीये. त्या अर्थी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार इ. स. १७२५ ला केलेला असावा, हे स्पष्ट होत आहे. कोकणातल्या मंदिरांच्या दृष्टीने हा इतिहास महत्त्वाचा आहे.
    ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत
          तेंडुलकर यांना यापूर्वी शंकरेश्‍वर मंदिर, लांजाला संघ नाथेश्‍वर मंदिरात शिलालेख आढळले. त्याचे वाचन त्यांनी केले. तसेच, धूतपापेश्‍वर मंदिरात द्वारपालाच्या डावीकडे मागे संस्कृतमधील शिलालेख सापडल्याचे सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी असे शिलालेख आहेत. त्यांचा आणखी शोध घ्यावा लागेल. साफसफाई करावी लागेल. त्यातून बरीच माहिती मिळू शकते. शिलालेख हे समकालीन व अस्सल विश्‍वसनीय पुरावे आहेत; परंतु ते सार्वजनिक ठिकाणी असल्याने दुर्लक्ष होत असून आपण ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत. हा ठेवा संरक्षित व्हावा, अशी भूमिका तेंडुलकर यांनी मांडली.
     
    गणेशगुळे : गलबतवाल्यांचा गणपती म्हणून येथील गणपती ओळखला जातो. हे मंदिर पुरातन असून, जांभ्या दगडामध्ये बांधले असून, चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे, असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बांधकामाला वापरली जाते. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ (गणपतीपुळ्याला) अशीही आख्यायिका आहे.
    पावसपासून जवळचे पुढचे ठिकाण म्हणजे गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे गणेशगुळे. थोडे आडवाटेला असल्याने पावस गावापासून जवळ असूनही हे सहसा कोणाला माहीत नसणारे ठिकाण. पावस गावातून बाहेर पडताच साधारण २ किलोमीटर अंतरावर ढाकणी मोहोल्ला एरियामधे रस्त्यांचे एक जंक्शन (चौक) लागते. इथून सरळ जाणारा रस्ता राजापूर-पूर्णगड-आंबोळगडाकडे तर उजवीकडे जाणारा छोटा रस्ता काझी मोहोल्ल्यावरून गणेशगुळ्याकडे जातो. गणेशगुळ्याचे गणपती मंदिर याच रस्त्यावर गणेशगुळे गावाच्या खूप आधी एका मोठ्या सडयावर (पठारावर) आहे. त्यामुळे गणपती मंदिर पाहण्यासाठी गणेशगुळे गावात जाण्याची गरज नाही. मात्र ज्यांना सुंदर समुद्रकिनारा पहायचा असेल त्यांनी एक बराच मोठा डोंगरउतार उतरून समुद्राकाठी वसलेले गणेशगुळे गाव नक्की पहावे.
    "गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला" या म्हणीवरून गणेशगुळे गाव आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे. जांभ्या दगडाची बांधणी असणारे हे पुरातन मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते. पूर्वी श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एके दिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते.
    स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशूळाच्या विकाराने आजारी होते. या आजाराला कंटाळून ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, "माझं इथे वास्तव्य असून, याठिकाणी असणा-या विहिरीतलं पाणी प्राशन कर, तुझी व्याधी बरी होईल". चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. तेव्हापासून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला.

     गणेशगुळेचा समुद्रकिनारा
     गणेशगुळे गावाजवळील किनारपट्टीवर समुद्रमार्गे गलबतांमधून व्यापार करणारे अनेक गलबतवाले पूर्वी या ठिकाणी व्यापारउदीम सुरळीत व्हावा, असं या गणपतीकडे मागणं मागायचे. तेव्हापासूनच हा गणपती ‘गलबतवाल्यांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हे मंदिर एका बाजूला टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे मन प्रसन्न व शांत करणारे आहे.
     गणेशगुळे येथे रहाण्याची सोयः-
    १) ओशेनो पर्ल बीच होम स्टे, गणेशगुळे : 02352-237800, 02352-219400, 8605599789, 9405340784
    2) “सरस्वती सदन”
    श्रीमती सुलोचना यशवंत नागवेकर
    मु.पो. गणेशगु़ळे, घर नं. ८५,
    ता. जि.- रत्नागिरी,
    Tel. 952352 237210
    रुम्स-३      उपलब्ध बेड- ६       टेरीफ- Rs.१50/-       जादा व्यक्तिसाठी-  Rs.५0/-
     आडिवरे, कशेळी परिसर
     पूर्णगड
    रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर पुढे फक्त १० किलोमीटर अंतरावर इतिहासकाळात घेऊन जाणारा पूर्णगड नावाचा एक छोटासा किल्ला लागतो. किल्ला अगदीच इटूकला म्हणजे जाता जाता फक्त ३० मिनिटे वेळ काढून पहावा एवढाच. किल्ला एका लहानश्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला मुचकुंदी नदीची खाडी तर पश्चिमेला पसरला आहे अथांग समुद्र त्यामुळे किल्ल्यावरून दिसणारे दृश अमाप सुंदर दिसते. कोणी म्हणत छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. तर कोण म्हणत लहान आकाराचा किल्ला म्हणजेच पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा हा किल्ला दिसतो म्हणून पूर्णगड. काही का असेना पण किल्ला अगदी छोटुसा आणि सहकुटुंब भेट देण्यासारखा.

    पूर्णगड हे किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्याचे गाव. कोकणी कौलारू घरांच्या रांगांमधून वर चढणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेने मोजून १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाज्याजवळ पोहोचतो. दरवाज्याच्या डाव्या हाताला एक विहीर दिसते. दाराशीच एक हनुमंताचे छोटेखानी मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. दरवाज्याच्या मध्यभागी गणपती तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसतात. आत असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या देवडय़ा अजूनही सुस्थितीत आहेत. दरवाज्याजवळच तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे ज्यावरून संपूर्ण गडाची फेरी मारता येते. बहुतेक ठिकाणची तटबंदी अजुनची उत्तम स्थितीतील आहे. याच तटबंदीत किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस एक लहानसा दिंडी दरवाजा आहे. आयताकृती असा आटोपशीर घेर असणाऱ्या या किल्ल्यात आत एक वृंदावन, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, दारूगोळा किंवा धान्य साठवण्यासाठी असणाऱ्या काही इमारती असे मोजकेच अवशेष दिसतात.
    कशेळी : येथे समुद्रकिनारी कनकादित्याचे म्हणजे सूर्यमंदिर आहे. मंदिराच्या आवारात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गा, श्री मारुती व श्री विष्णूचीही मंदिरे आहेत. कनकादित्य मंदिरावर तांब्याचा पत्रा आहे. हे सूर्यमंदिर प्राचीन असून, सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे असावे. शिलाहार वंशातील भोजराजाने शके १११३मध्ये दानपत्र लिहून दिलेला ताम्रपट आजही मंदिरात पाहावयास मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे १६६१मध्ये भेट दिली होती. इतिहासाचार्य राजवाडे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बॅ. नाथ पै यांची कनकादित्यावर श्रद्धा होती.
     
    रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणारे कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर हे भारतातील मोजक्याच सूर्य मंदिरापैकी एक. निसर्गाचा सुंदर वरदहस्त लाभलेले कशेळी गाव रत्नागिरीपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातले कनकादित्य सूर्यनारायणाचे मंदिर हे एखाद्या कोकणी घरासारखेच वाटते. पुर्णपणे लाकडाने बनवलेले हे अत्यंत सुंदर मंदीर निश्चितच पाहण्यासारखे आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे खांबांवरील नक्षीकाम तसेच अनेक देवदेवतांच्या व पुराणातील निवडक प्रसंगांच्या कोरलेल्या लाकडी प्रतिमा अतिशय सुंदर आहेत. गाभाऱ्यात कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे. हि मूर्ती सुमारे ९०० वर्षापूर्वीची आहे असे सांगतात. 
     
    मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात कथा सांगितली जाते ती येथे देतोय. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजार्‍याने दक्षिणेकडे जाणार्‍या एका व्यापार्‍याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळीजवळ समुद्रकिनार्‍याजवळ अडकले. कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्याने नावाड्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील एका गुहेत आणून ठेवली आणि जहाज सुरू झाले व पुढे मार्गस्थ झाले. काही वर्षांनी गावातील कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 
    त्या कनकेचा आदित्य म्हणजे सूर्य म्हणून यास 'कनकादित्य' असे संबोधले जाते. समुद्रकिनार्‍यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची एक नैसर्गिक गुहा आहे, ज्या गुहेत ही मूर्ती सापडली. त्या गुहेला आता 'देवाची खोली' असे म्हणतात. 


     कनकादित्य मंदिराची जुनी प्रकाशचित्र
          बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्याचे पुजारी होते. त्यांची किर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहारराजा शके १११३ मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्रस्नानासाठी कशेळीला आला असताना त्याने ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिला, असे वर्णन करणारा ताम्रपट या मंदिरात आहे. हा ताम्रपट सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्याने हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट सध्या मंदिरात न ठेवता बँकेच्या लॉकरमधे ठेवण्यात आला आहे. मंदिराचे आवार खूपच प्रशस्त असून मंदिर परिसरात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी इतरही चार छोटी मंदिरे आहेत. शिवाय एक मारुती मंदिर देखील आहे. मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीरदेखील आवर्जून पहावी अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्यावेळी कशेळी गावाला भेट दिल्याचे देखील स्थानिक लोक सांगतात. मंदिराजवळ नुकताच एक मोठा भक्त निवास बांधण्यात आला आहे. 
          इथे मुक्काम करावयाचा झाल्यास भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्‍वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक - ०२३५३-२२६३१७ किंवा रमेश पांडुरंग ओळकर ०२३५३-२२६३२३.
    आडिवरे : नवसाला पावणारी आडिवरे गावची महाकालीदेवी प्रसिद्ध आहे. दक्षिणाभिमुख असलेल्या देवीची वाडा पेठ या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. आद्य शंकराचार्यांनी श्री महालक्ष्मीची स्थापना केल्याचे मानले जाते. मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजूला महालक्ष्मी आहे. महाकाली मंदिर परिसरात योगेश्वरी, नगरेश्वर, रवळनाथ मंदिरे आहेत. पावसवरूनही येथे येता येते.
    कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून फक्त चार किलोमीटरवर अंतरावर असणारे आडीवरे गावातील महाकालीचे जागृत देवस्थान. पुन्हा रत्नागिरी-राजापूर या मुख्य रस्त्यावर आलो आणि उजवीकडे राजापूरकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर लगेच एक छोटासा घाट उतरला कि उजवीकडे लागतो व्येत्येच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा रस्ता तर अगदी थोडसंच पुढ रस्त्याच्या डाव्याबाजूला दिसते महाकालीचे कौलारू मंदिर.
         रत्नागिरी-आडिवरे हे अंतर ३९ किलोमीटर तर राजापूर-आडिवरे हे अंतर २८ किलोमीटर. थोडक्यात काय तर रत्नागिरी शहर किंवा राजापूरपासून आडिवरे तसं जवळ जवळ सारख्याच अंतरावर. कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणेच आडिवरे गावातील महाकालीचे देवस्थान रत्नागिरीच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे आडिवरे हा गाव धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. अनेकांची कुलदेवता असलेल्या या देवीचे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी १३२४ मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. असे म्हणतात कि कशेळीच्या मंदिरात असणाऱ्या ताम्रपटात 'अट्टविरे' नामक गावाचा उल्लेख आढळतो, तेच हे आडिवरे. शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक थोरांनी या मंदिराला भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे लोक सांगतात.
        आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्‍यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी
    नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने
    दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मल वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली. 
           मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शन
    घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण
    परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे.
              आडिवरे येथील महाकलीच्या या सुंदर पण नुकतेच जीर्णोद्धाराचा साज चढवलेल्या मंदिरात महालक्ष्मीचे पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे एकाच मंदिरात महाकाली, योगेश्वरी, महालक्ष्मी, महासरस्वती आणि रवळनाथ असे पाच देवतांचे अधिष्ठान आहे. महाकालीची मूर्ती चतुर्भुज असून काळया पाषाणात कोरलेली आहे. या दक्षिणाभिमुख मूर्तीच्या मस्तकावर पंचमुखी टोप, एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात तलवार तर चौथ्या हातात पंचपात्र आहे. मंदिर गाभाऱ्यात फोटोग्राफी करण्यासाठी मज्जाव असणारा बोर्ड लावलेला असल्यामुळे या सुंदर मुर्त्यांचे फोटो मात्र काढता येत नाहीत.
           दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला
    वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 
           मंदिर आवारातच एक विहीर आहे. आता या विहिरचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या विहिरीवर असणारा एक लाकडी रहाट. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरली जाणारी रहाटाची पद्धत खूप दिवसांनी येथे पाहायला मिळाली.

    गावखडी : रत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर गावखडी किनारा आहे. उजव्या बाजूला दाट सुरुबन आहे व एक किलोमीटर लांबीचा सुंदर सागरकिनारा आहे. गावखडीच्या किनाऱ्यावरून पूर्णगड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. गावखडी येथे कासव ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी संरक्षित करून पिल्ले समुद्रात सोडली जातात. श्री. डिंगणकर व त्यांचा मित्रसमूह गेलेली पाच वर्षे कासवांवर संशोधनही करीत आहे. त्यामुळे या ठिकाणाला नवीन ओळख मिळाली आहे. या वर्षी १५ घरट्यांमध्ये अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. पावस-गावखडी हे अंतर नऊ किलोमीटर आहे.

    देवाचे गोठणे : श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते.

    आंबोळगड 

    नाटेपासून पुढे फक्त ५ किलोमीटर अंतरावर आंबोळगड आहे. यशवंतगडाप्रमाणेच मुसाकाजी बंदरावर लक्ष देण्यासाठी आंबोळगड या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. तटबंदीच्या तुरळक अवशेषावरून येथे पूर्वी किल्ल्या होता एवढीच काय ती या आंबोळगडाची राहीलेली ओळख. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे.
    किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत. 
         गडाच्या मधोमध ऐश्वर्यशाली व राजेशाही थाट असलेले वडाचे झाड जणू त्या गडावर सत्ता गाजवत आहे असे भासते. तिथे असणारी घनदाट झाडे सूर्यकिरणांना आत शिरण्यास मज्जाव करतात असे वाटते.
        आंबोळगड गावात प्रवेश करताच डावीकडे सुंदर असा समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. इतका शांत, स्वच्छ आणि निर्मनुष्य समुद्रकिनारा म्हणजे बागडायला आणि आंघोळीसाठी आमंत्रणच .आंबोळगडाचा समुद्रकिनारा खुपच विस्तीर्ण आहे. इथे फार वावर नसल्याने समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या विविध आकाराच्या शंखांचा नुसता सडा पडलेला असतो. आंबोळगडाच्या त्या विस्तीर्ण समूद्रकिनाऱ्यावर, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघणारी सोनेरी वाळू आणि फेसाळणा-या लाटा यांच्याशी मस्ती करताना वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. 
          आंबोळगड किल्ला आणि समुद्रकिनार्‍याबरोबरच आंबोळगड परिसरात बघण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे गगनगिरी महाराजांचा आश्रमः-
     गगनगिरी महाराज आश्रम आंबोळगड
     आंबोळगडाचे अवशेष पाहून परत मुख्य रस्त्यावर येऊन २०० मीटर पुढे गेल्यावर अफाट पसरलेल्या पठाराचा भाग दिसतो. तिथून सरळ पुढे गेल्यावर रस्ता एक वळसा घेऊन संपतो.
    तिथेच आंबोळगडला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाडय़ांचा शेवटचा थांबा आहे.
    त्याचा डाव्या बाजूस गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमाच्या कंपाऊंडमध्ये एक सुंदर दत्त मंदिर आहे.
     
     या ठिकाणी समुद्राने वेढलेल्या विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. महाराजांचे भक्त या पवित्र आश्रमाला जरूर भेट देतात. आंबोळगडाच्या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाचा परिसर इतका शांत आहे की लगत असलेल्या सागराच्या रौद्रभीषण लाटांची गाजच फक्त परिसराची शांतता भंग करत राहाते.हे पठार डोंगराच्या कडेला संपते. याच कडय़ापासून समुद्र ४०-५० फूट खोल आहे. समुद्राच्या लाटा सतत गडाच्या दगडी कठडय़ाला येऊन आदळतात आणि त्यामुळे निर्माण होणारे शुभ्र फेसाळ कारंजे आल्हाददायक वाटतात.

    आश्रमाच्या शांत परिसरात मागील बाजूला गगनगिरी महाराजांनी जिथे तपश्चर्या केली त्या गुहेला भेट देतां येते. इथे भेट दिल्यावर सुंदर निसर्गाविष्कारा बरोबरच एका तपोभूमीला भेट दिल्याचे समाधान मिळते. आंबोळगडाचा तुटलेला काळाकभिन्न कडा, विस्तीर्ण निळाशार समुद्र, खाडीमुखावरचा आंबोळगड हे सारे काही एका दृष्टीक्षेपांत न सामावणारे पण अविस्मरणीय असे आहे.
     या बरोबरच परिसरातील गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर यांना भेट देता येईल.
    वेत्ये बीच :-
    आडिवरे जवळच्या वेत्येच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचे ठरवले. आडिवरे गावानंतर लगेचच डावीकडे 'वेत्ये चौपाटीकडे' असे लिहलेल्या रस्त्यावर  फाट्यापासून समुद्रकिनारा फक्त ३ किलोमीटर. आहे 
       वेत्ये गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते.

    संदर्भः
    १) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
    २) https://ratnagiritourism.in हि वेबसाईट
    ३) https://www.bytesofindia.com
    ४) http://yashvartak.blogspot.com/2015/12/blog-post_13.html
    ५) https://www.maayboli.com/
    ६) https://sites.google.com/site/weekendtravelplans/
    ७) https://www.pudhari.news/news/Konkan/
    ८) https://www.esakal.com/kokan/
    ९) https://www.lokmat.com/ratnagiri/
    १०) http://prahaar.in
    ११) https://talukadapoli.com/places/
    १२) http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_15.html
    १३) http://www.misalpav.com

      discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...