Saturday, December 10, 2022

सप्तेश्वर आणि सोमेश्वर...पूर्णगड, रत्नदुर्ग, जयगड आणि देवघळी, गणपतीपुळे

 https://treklikevaibhavsachin.blogspot.com/2022/09/sapteshwar-and-someshwar-places-to.html

 


- हे कधी बांधलेले आहे?

- काय म्हायती रे बावा, मी पन या गावात सासरवासीन आलेली हाय

मंदिरात कुठलातरी औषधी पाला शोदायला आलेल्या पंचाहत्तरीच्या जवळपासच्या आजीने दिलेलं हे उत्तर. आम्ही दोघेही इथले 'माहेरवासीन' असूनसुद्धा आम्हाला कुठे माहीत होतं. माझं मूळ गाव तर इथून फक्त वीस-एक किलोमीटरवर आहे, कॉलेजपर्यंत सगळी उन्हाळ्याची सुट्टी याच गावात घालवली आहे मी, तालुका पण तोच, या रस्तावरून जवळपास हजार एकवेळा येजा केली असेल; तरीही नावसुद्धा ऐकलं नव्हत या सुंदर ठिकाणांचं...सप्तेश्वर आणि सोमेश्वर!

मुंबईचा चाकरमानी गणपतीसाठी कोकणात कसातरी पोहोचतोच. मुंबई-गोवा हायवेची चांद्रमोहिम, चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या टेरिफिक ट्राफिक प्रवासाचा अनुभव आणि न मिळणाऱ्या सुट्टीच्या कारणास्तव, शनिवारी प्रवास केला. रविवार जरा सार्थकी लावावा म्हणून जवळची ठिकाण शोधत होतो तेव्हा या दोन ठिकाणांची महिती मिळाली. तीन-एक किमी ऑफरोड असल्यामुळे बाईक घेऊन येण्यासाठी भूषण यांना आग्रह केला आणि निघालो.

शास्त्री पूल पार करून संगमेश्वरकडे जाताना, मुळये हॉस्पिटलच्या विरुध्द दिशेला एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. हाच उभ्या चढणीचा, कच्चा-पक्का, वेडा-वाकडा ३ किमीचा रस्ता एका ओढ्यापाशी दुभंगतो. दुतर्फा गर्द झाडीने इंटर दि जंगल झाल्यावर, डावीकडे सप्तेश्वर आणि उजवीकडचा देवपाट वस्तीकडे जातो. ओढ्याच्या शेजारीच जांभ्या दगडाच्या कुंपणामध्ये हे मंदिर वसवलेले आहे. आत प्रवेश केल्यावर प्रथम मंदिर लागतं. मंदिर आणि सभामंडप बऱ्यापैकी मोठं आहे. सभामंडपात नंदी आणि जुना गणपती दारावर आहे. आतली शंकराची पिंड तीच्या पुरणतेची जाणीव करून जाते. लिंग नव्हतं पिंडीवर. बाहेर लिंगाच्या आकाराचं तांब्याचं पात्र होत बहुतेक हेच लिंग असावं. मंदिराच्या उजव्या बाजूला वैजनाथाच लहानसं मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सात कमानी आहेत, याच समोर दोन कुंड आहेत. जांभ्या दगडात चुन्याचा वापर करून ही सुंदर वास्तू उभारली आहे. सहसा गड-किल्ल्यांवर दिसणारं, चुन्याचं घाण्याचा चाक पहिल्यांदाच एका मंदिराच्या प्रांगणात पाहिलं मी. या कामानीचं बांधकाम मला सातवाहन काळातील वाटलं, प्रत्येक कमानीवर शरभशिल्प आणि कमळपुष्प कोरलेलं आहे अगदी गडांच्या प्रवेशद्वारावर असतात तशी. दोन बाजूच्या कमानी मोठया आणि मधल्या पाच आकाराने लहान आहेत. कमानीच्या आतमध्ये जाऊन पाहिलं की जलव्यवस्थापनाचं उत्कृष्ठ उदाहरण पाहता येत. या सातही कमानीच्या मागे सात पाण्याचे झरे अगदी एका रांगेत बांधले आहेत. एकमेकांना विशिष्ठ पध्दतीने जोडलेल्या आयताकृती जलवाहिन्यांनमधून पाणि मधल्या कामानीमध्ये येत आणि इथून कुंडात गोमुखातून प्रवाहित होत. डोंगरात झिरपनाऱ्या सात झऱ्यांना एकत्र आणणारा म्हणून तो 'सप्तेश्वर' ! हे ठिकाण म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना. या कुंडाचे पाणि बारमाही असते. मंदिराच्या समोरून एक ओढा खाली गावांमध्ये जातो. याच डोंगरात अलकनंदा नदीचा उगम आहे कुठंतरी.

कोकणाला तसा निसर्गाचा वरदहस्त लागलेला आहेच आणि अशा ठिकाणी 'एकांत' नक्की काय असतो तो अनुभवायला मिळाला. कुंडाच्या थंड पाण्यात पाय बुडवून त्यातल्या माश्यांची फिश थेरेपी की काय म्हणतात ते घेत, आजूबाजूच्या पक्षांचे मधुर स्वर कानावर घेत काही क्षण घालवले. 

आमच्या या कोकण पट्ट्यात ३०० हुन अधिक शंकराची पुरातन मंदिरे आहेत असं म्हणतात. सप्तेश्वर, बघून आम्ही 'कर्णेश्वर' पाहायला आलो. हे हेमाडपंथी मंदिर, काय बारीक कलाकुसर आहे या मंदिरावर. मी हे अगोदर पाहिलं होतं अगोदर पण भूषण यांनां पाहायचं होतं आणि पहाण्यासारखच आहे हे. कसब्यात छत्रपती समभाजींना मुजरा केला आणि पुढे चिपळूणच्या दिशेने निघालो आमच्या आजच्या तिसऱ्या 'श्वर' दर्शनाला, 'सोमेश्वर'.

संगमेश्वर ते चिपळूण या वाटेवर ३ गरम पाण्याचे कुंड आहेत. चिपळूणच्या दिशेनं तुरळ गावाच्या अगोदर 'राजवाडी' गाव लागतं, या गावात गरम पाण्याचं सुंदर कुंड आहे. चिराच्या आणि कौलारू बांधकाम करून बांधलेलं. या कुंडाच्या समोर एक कमान दिसते ती आपल्याला लाकडी बांधकाम असलेल्या पुरातन सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेऊन जाते. मंदिर अगदीच साधं, लाकडी सभामंडप, दगडी बैठक, शेणाने सारवरलेली जमीन. मंदिराच्या सभामंडपात कमानीवर पुराणातील गोष्टी लाकडी खांबावर कोरलेल्या आहेत, पैकी राम-लक्ष्मण-सीता यांचा वनवास, द्रौपदी वस्त्रहरण आम्ही ओळखू पाहिलो. इथून आत गेल्यावर नंदी आणि समोर एक मजली गाभारा आहे. दगडी पायऱ्या उतरून शंकराची पिंड आणि त्याच्या वरच्या मजल्यावर गणपतीची दगडी मूर्ती. एकमजली गाभारा, हे पण नवीन होत आमच्यासाठी. मंदिरासमोर पुरातन दीपमाळ एका चौथऱ्यावर उभी आहे. मंदिर, चारी बाजूनी जुन्या चिऱ्याच्या भिंतींनी बंदीस्त केलेलं असावं अगोदर आता काही अवशेष उरले आहेत. मंदिराच्या उजवीकडे आजून एक कमान आहे ती बाजूच्या नदीवर घेऊन जाते. नदीच्या काही भागात पण गरम पाण्याचे झरे आहेत हे ऐकलं होतं पण वाट सापडतच नव्हती माजलेल्या गवतावून खूप प्रयत्न केला शोधायचा पण फसला. परत कुंडाजवळ येऊन काही काकू होत्या त्यांना वाट विचारण्याचा प्रयत्न केला पण, 'वाट मुरली आता माजलेल्या गवतात' अस उत्तर मिळालं. थोडासा हिरमुस झाला पण निघालो परत.

सोमेश्वर, सुंदर असं नैसर्गिक गरम पाण्याचं आणि थंडगार अशा मनशांती घेण्याचं आजून एक ठिकाण.

पुढे चिपळूणच्या दिशेने रस्ताच्या कडेला आजून एक गरम पाण्याच कुंड आहे. या कुंडाचे पाणि जरा जास्तच उकळतं असल्याने थोडं खोल बांधलं आहे. मागे एका पाण्याच्या पऱ्यात एक कुटुंब आपल्या कामात गुंग होत. गृहिणी कपडे धुण्यात आणि गृहस्थ पऱ्याचे पाणी आपल्या मुलाच्या अंगा-खांद्यावर ओतत होता. त्या पाल्याचे ओरडने आणि पाणि पडल्यावर अंग चोरणे यावरून पाण्याची उष्णता कळून आली. या कुंडाजवळ, एका हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आहेत. बाजूला एक नवीन मंदिर आणि काही ग्रामस्थ होते. मंदिर होत 'केदारेश्वराचे'.

पुढे आरवली इथे सुद्धा एक गरम पाण्याचे कुड आहे पण त्याची अवस्था आता बिकट झाली आहे, नको ताशा वापरामुळे.

कोकण म्हणजे खरंच स्वर्ग, एकांत पाहिजे असेल तर अशी हजारो ठिकाणं आहेत इथे, स्वतःशीच एकरूप होण्यासाठी!


- वैभव आणि भूषण.

युट्यूबवर अनुभवा - https://youtu.be/IW_oLw-Ec_Q




"अरे काही नाही सहज क्युरूओसीटी होती म्हणून फोन केला! 31stला तू गोव्यात नक्की काय करत असशील?"
- नरेश बने (एक जीवश्य कंठश्च)

हाच प्रश्न खरंतर मलाही पडला होता कारण आपण पु.लं.च्या 'सखाराम आप्पाजी गटणे' यांचे अनुयायी; "उत्तेजक पेयांपासून पहील्यापासून अलिप्त !" पण गृहस्थाश्रमात, पुरुषवर्गातील प्रत्येकाला आपल्या गृहदेवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी फक्त वर्षाअखेरीस नाही तर ३६५ दिवस अश्या तडजोडी कराव्याचं लागतात, इच्छेविरुद्ध असल्या तरीही !! असो, आपण विषयाकडे वळू सध्या; पुरुषजातीच्या व्यथा मांडण्यासाठी निवांत 'बसू' कधीतरी...

एक -  अगवाडा किल्ला, "हा किल्ला; इथेच त्या 'दिल चाहता है' च्या त्या फेमस गाण्याची शुटिंग झालेली." गोव्यात जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांना तिथल्या गाईडांनकडून दिली जाणारी अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि बहुतेक यामुळेच इथे गर्दी जमते.

दोन - जयगड, विजपुरकरांनी १६व्या शतकात बांधलेला पण संगमेश्वर येथील नाईकांनी जिंकून खूप वर्ष पोर्तुगीज आणि विजापूर यांच्या स्वाऱ्या रोखून नेटाने राखलेला. सरतेशेवटी १८१८ मध्ये इंग्रजांनी काबीज केलेला. इथे फक्त आमच्यासारखी चार डोकी.
दोन किल्ले, सारखेच, नद्यांच्या खाडीवर समकालीन निर्माण केलेले; परकीय राजवटीत उभारलेले; पाठीशी अरब समुद्र एकसमानचं; पण एकाच्या नशिबी भरपूर प्रसिद्धी तर दुसरा जवळजवळ दुर्लक्षित आणि अज्ञातवासात; एकाला काल्पनिक वर्तमान आणि दुसऱ्याला प्रदिर्घ आणि लढवय्या इतिहास.

अवगाडा किल्ला, पोर्तुगीजांनी १६१२ मध्ये, डच आणि मराठी आरमारापासून रक्षण करण्यासाठी आणि व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता; असं जर सांगितलं तर कुत्रं सुद्धा फिरकणार नाही इकडेही.

इतिहास! सोप्या शब्दात, 'इति' म्हणजे 'असं' आणि 'हास' म्हणजे 'होत' (so indeed it was). आपण नेहमीच वर्तमानात जगतो, भविष्यात रमतो पण हे दोन्ही काळ ज्याच्यामुळे आणि ज्याच्यावर उभे आहेत तो काल-इतिहास आपण विसरतो किंवा जाणीवपूर्वक नजरंदाज करतो.
फिलॉसॉफी जरा जास्त झाली, 'फील नॉट सो हॅपी' ....म्हणून बस करतो आता!

ऐन गर्दीत (जिथे मी कायम एकटा असतो) गोवा केला, अर्धांगिनी प्रसन्न! आजून एक दिवस काढुन कोकणातले तीन किल्ले केले, उरलेलं अर्धांग म्हणजे मी प्रसन्न!

आपल्या महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि यामुळेच आपल्याकडे जलदुर्ग उभारण्याची गरज निर्माण झाली. जवळपास शंभरएक जलदुर्ग, काही उभ्या समुद्रात तर काही किनाऱ्यावर विसावलेले आहेत. यातलेच काही, एका दिवसात होतील तितके करून माझ्या मूळ गावी जाऊ असा तह मी गोवा मोहिमेवर असताना घरच्या किल्लेदाराबरोबर केला होता. माझ्या गावच्या भावाला, समीरला, गोव्याहूनच फोन करून प्लॅन सांगितला आणि तोही तयार झाला. रत्नागिरीत जयगड मुख्य आकर्षण, जोडीला पूर्णगड, विजयगड आणि गणपतीपुळे करू. समीर आला सकाळी लवकर आणि निघालो आम्ही ७च्या दरम्यान. विजयगड जास्त वेळ खाईल आणि काही अवशेष ही नाही आहेत किल्ल्याचे पहायला म्हणून गाडीत चर्चा करून त्यावर फुली मारली आणि वाटेतील रत्नदुर्ग आणि अजून एक नवीन प्रेक्षणीय स्थळ लिस्ट मध्ये ऍड केलं. 

रत्नागिरीच्या पूर्वेला एक समांतर वाट गेलेली आहे, भाट्येची खाडी, पावस, गणपतीपुळे आणि शेवट पूर्णगड. सकाळी ८च्या दरम्यान आम्ही पूर्णगड गाठलं. रत्नागिरीवरून जवपास ३१ किमीवर हा किल्ला आहे. मुचकुंदि नदीच्या खाडीच्या उत्तर टोकावर असणाऱ्या टेकडीवर, खाडीतून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला आहे. आमची गाडी थेट गावाच्या मंदिरापर्यंत पोहोचली इथून किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात या आम्हला ५ मिनीटात किल्ल्यापर्यंत घेऊन गेल्या. पायर्याच्या शेवटी दोन भक्कम बुरुज नजरेस पडतात. डाव्या बुरुजासमोर मारुती एका छोटेखानी मंदीरात वसवलेला आहे तर दुसऱ्या बुरुजास लागून एक पाण्याचं मोठं बांधीव टाक किंवा विहीर आहे. मंदीर, पाणि टाक आणि बाकी किल्ल्याची नुकतीच डागडुजी केलेली दिसत होती पुरातत्व खात्याकडून. दोन बुरुजांमध्ये प्रवेशद्वार दडवलेले आहे जेणेकरून बाहेरून शत्रूला फक्त बुरुजच दिसावेत. प्रेवेशद्वारावर मध्यभागी गणपती मांगल्याचे आणि बाजूला चन्द्र-सूर्य अखंड स्थैर्याचे प्रतीक म्हणून कोरलेले आहेत. मुख्य लाकडी दरवाजा अगदी अलिकडे बनवलेला होता आणि वर मोठं कुलुप पुरातत्त्व खत्याच. बाजुच्या घरांमध्ये विचारपूस केली आणि कळलं की ९ च्या नंतर रत्नागिरी वरून खात्याची माणसं येतात आणि किल्ला उघडतात. या एका तासाची चैन आम्हाला परवणारी नव्हती म्हणून तटबंदीला धरुन गडफेरी सुरू करून आता जाण्यासाठी कोणती दुसरी वाट आहेत का पाहायचं ठरवलं पण पूर्ण तटबंदी व्यवस्थित डागडुजी करून नवीन केली आहे. किल्ल्याला सहा बुरुज आहेत पैकी समुद्राकडे असणाऱ्या बुरुजास लागून लहान दरवाजा होता पण तोही कुलुपात. हा किल्ला तसा आटोपशीर. आयतकृती किल्ल्यात सदरेच्या इमारतीचे जोते, किल्लेदाराचा वाडा, धान्य व दारुकोठर यांचे अवशेष आहेत पण ते आम्ही पाहू शकलो नाही. १८३६ च्या एका अहवालात या किल्ल्यावर ७ तोफा आणि ७० तोफगोळे आढल्याची नोंद आहे पण आता ते कुठे दिसत नाहीत, सगळाच इतिहास वर्तमानात पोहोचतोच असे नाही.
पूवर्णगड हे एक अगदीच छोटसं गाव, उतरत्या घराचं, आंबा, फणस, काजू, नारळी पोफळीच्या बागांच्या सावलीत शांत विसावलेल. परत उतरताना अनेक जुन्या पडक्या घराचे अवशेष दिसले. गाडी लावली होती तिथल्या पुरातन मंदिराला भेट देऊन आम्ही निघालो.
पुढचा बेत होता कशेळी गावाजवळील पर्यटकांसाठी अलीकडेच खुल्या केलेल्या 'देवघळी' चा. बांधून सुंदर केली आहे ही जागा; वरून अफाट समुद्र आणि एका बाजूला एक लहानसा किनारा, उभ्या उंच कातळात समुद्राने स्वतः तयार केलेला. इथून लगेच निघून आम्हाला आता रत्नदुर्ग गाठायचा होता. वाटेत 'कनकादीत्य मंदिराला' भेट दिली. मीच काय पण समीरनेही पाहिलेल कोकणातलं दुसरचं प्राचीन विष्णू मंदिर असेल. कोकणाला परशुरामभूमी जरी म्हणत असले तरी इकडचे डोंगर-दऱ्या-कडे-कपारे-कडे-कपारे-कपारे राकट महादेवाचे पूजक. या कनकादित्य मंदिरात आम्ही हापूस आंब्याचं 'नवं' करायला मिळाल. आमच्याकडे वर्षाचा पहिला हापूस चाखणे याला 'नवं' करणं म्हणतात. सुंदर आणि प्राचीन मंदिर पाहून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो, रत्नदुर्ग पाहायला.

रत्नदुर्ग किल्ल्याची निर्मिती फार पूर्वी बहमनी राजवटीत झाली. १६७० साली राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. किल्याचा नाळेच्या आकाराचा असून तो अंदाजे १२० एकर मध्ये पसरलेला आहे. तीन बाजूनी समुद्र आणि एका बाजूने जमीन असा हा किल्ला रत्नागिरी बंदरात होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. आता या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाते आणि आशा मांसाळलेल्या किल्यांची जी गत होते तीच याची झाली आहे. ऑईलपेंट मारलेले बुरुज, प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना टाईल्स, दोन हत्ती आणि तरुणांचा हँगिंग पॉईंट. प्रवेशद्वारातून आत जाताच भगवती देवीचे मंदिर लागते समोरच कान्होजी आंग्रे यांची मूर्ती. या किल्ल्याच आकर्षण म्हणजे भुयारी मार्ग. भागवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर चारही बाजूने बंदीस्त  केलेली एक जागा दिसते हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. हा मार्ग जरी आता वापरात नसला तरी या भुयाराच एक टोक असलेली गुफा खालून सामुद्रातून दिसते. इथुन पुढे तटबंदीवरुन चालत जाताना अनेक बुरुज लागतात आणि या बुरुजावरून समुद्राचे विहंगमय दृश्य दिसते. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दिपगृहवरून पूर्ण रत्नागिरी शहर दिसते. हा किल्ला मी २००१ मध्ये पाहिलेला पण आता तो एक पिकनिक पॉईंट बनला आहे. पुढे जयगड गाठले आम्ही.

जयगड, १६ व्या शतकात विजपुरकरांनी बांधला पण फार काळ ते या किल्ल्याचा ताबा ठेवू शकले नाहीत आणि हा किल्ला संगमेश्वर येथील नाईक यांनी हा जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीज आणि विजपुरकरांनी सतत चढाया केल्या पण हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. खाडीतून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी, शास्त्री नदी जिथे समुद्राला मिळते त्या जयगड खाडीवर दोन किल्ले बांधण्यात आले, दक्षिण तीरावर जयगड आणि उत्तर तीरावर विजयगड. जयगड हा किल्ला पठारावर वसलेला आहे म्हणून याच्या तटबंदीला लागून खंदक खोदले आहेत जेणेकरून शत्रू थेट किल्ल्याच्या भिंतींना भिडू शकत नाही.
किल्ल्यासमोर गडी लावून आम्ही आमची गडफेरी सुरू केली. दोन भक्कम बुरुज समोर दिसले पैकी एक सिमेंट ने मुलामा दिलेला होता तर दुसरा अजूनही लाल जांभ्यात होता. या बुरुजात ब्रिटिश काळात कार्यालये उभारल्यामुळे बुरुजांची अवस्था तिकीट काऊंटर सारखी शोभा गेलेली झाली आहे.   किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार या दोन बुरुजांनी झाकलेले होते म्हणजे शत्रूला समोरून थेट मारा दरवाजावर करता येऊ नये.
प्रवेशद्वारावर दोन बाजुना कमळ कोरलेले आहेत पण मधले द्वारशिल्प तुटल्यामुळे नक्की कसली आहे ते कळत नाही. प्रवेशद्वाराला लागून देवड्या आहेत. पुढे प्रवेशद्वाराला लागूनच तटबंदीत दोन्ही बाजूला दोन कोठार आहेत, ही बहुतेक धान्य किंवा दारू कोठार असावीत. या कोठरावरील पायऱ्या चढून आम्ही तटबंदीवर प्रवेश केला. इथून बुरुज पहता येतात. एका बुरुजामध्येतर टाईल्स लावून प्रॉपर टॉयलेट्स बनवले आहेत इंग्रजांनी. हे बुरुज पाहून पाहून आम्ही तटबंदीवरुन गडफेरी सुरू केली. डाव्या वाजुच्या पहिल्या बुरुजावरून खाडी आणि बंदरावर नजर फिरवली. पुढील समुद्राकडील बुरूजावर इंग्रजांनी त्रिकोणी इमारत बांधली आहे. या बुरुजाच्या फांजी वरून खाली उतरून तटबंदीला लागलेल एक कोठार दिसतं, या कोठारातून किल्ल्याचा समुद्राकडील प्रवेशद्वार आहे. इथून किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या इमारतीकडे निघालो, मध्ये काही घरांसारखे अलीकडेच बांधलेल्या खोल्या दिसल्या. पुढे आम्ही वाड्याचा अवशेषांची पाहणी केली बहुतेक हा किल्लेदाराचा वाडा असावा. वाड्याच्या भिंती आणि कमानी बऱ्यापैकी पाहण्यासारख्या आहेत. ईथुन पुढे आम्ही किल्ल्याच्या मधोमध असलेली दोन मजली इमारत पहिली, बहुतेक ही इंग्रजांनी बांधली असावी. या इमारतीच्या बाजूला असलेले पाण्याचे दोन मोठे हौद पाहून दुसऱ्या बाजूच्या जुन्या गणपती मंदिरात आम्ही दर्शन घेतले. गणेशाचे दर्शन घेतल्यावर समोर जयबाचे मंदिर आणि समाधी आहे. किल्लेबांधणीच्या वेळी या जयबाचा बळी दिला गेला होता आणि म्हणूनच या किल्ल्याला जयगड नाव पडले अशी आख्यायिका आहे. पुढे प्रवेशद्वारापाशी येताना दोन विहिरी दिसल्या पण या कोणीतरी बांधून ठेवल्या होत्या म्हणून जवळून पाहता आल्या नाहीत. किल्ल्यातुन बाहेर पडून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला एक दुसरे प्रवेशद्वार आहे ते आपल्याला गडाच्या पडकोटाकडे घेऊन जाते पण अंधार पडायला सुरुवात झलेली आणि आम्हाला गणपतीपुळे गाठायचं होतं म्हणून निघालो. या पडकोटातून आत गेल्यावर एक गुफेत मोहमाया देवीचे ठाणे आहे. या ठाण्याच्या आसपास दोन दगडी खांब आहेत पैकी एक खांब तटबंदीवरुन आम्ही पहिला होता. वेळेच्या अभावी आम्ही गणपतीपुळे गाठलं, दर्शन घेऊन सूर्यास्त अनुभवला आणि माझ्या गावी पोहोचलो.

गोव्याहून परतीच्या वाटेवर ३ किल्ले पाहिले आणि तेही फॅमिली सोबत पहिल्यांदाच. गणपतीपुळे करणाऱ्यांनी थोडी वाट वाकडी करून जयगड पहावा, किल्ला खरचं पाहण्यासारखा आहे.

- वैभव आणि सचिन (यावेळी समीर पण).



यूट्यूब वर पहा आणि अभिप्राय कळवा. व्हिडीओ थोडा मोठा आहे कारण मी आजूनही विद्यार्थीदशेत आहे. कृपया गोड मानून घ्या!
































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...