आता अजून एक रूम शोधण्यासाठी डॉक्टर आणि अभिजित कामाला लागले. त्यांनी एक झक्कास जागा मंदिराच्या बाहेर शोधून काढली. सगळी मंडळी अशी येणारी प्रत्येक वेळ जुळवून घेत असेल तर भटकंतीला एक आगळा वेगळा साज चढतो आणि तत्यासमयी घडणारे असंख्य किस्से आपल्या आठवणींच्या किस्स्यात नेहमीच अधिराज्य गाजवतात. ती थंड पाण्याची अंघोळ आणि त्यासाठी लावलेले नंबर, चार्जींग साठी असणारा एकमेव सॉकेट आणि मी आधी मी आधीचा गजर, अनेक नको-नको त्या विषयाच्या रंगणाऱ्या चर्चा ह्यांनी एक वेगळाच माहोल तयार होतो.
फ्रेश झाल्यावर सगळे पुन्हा एकत्र जमलो आणि चहाचा भुरका घेऊन मंदिर दर्शनाला घुसलो. शाळेच्या सहली असल्याने त्या मुलांच्या घोळक्यातुन आत घुसताना गोंधळ उडाला. त्यात त्यांची कानडी भाषा. हैला आपल्याला शिव्या घालताहेत की त्यांच्या त्यांच्यात बोलताहेत काहीच कळायला मार्ग नाही. शाळेची गर्दी ओसरल्यावर देवीचे दर्शन झाले.
बनशंकरी किंवा वानशंकरी असे दोन संस्कृत शब्द आहेत, वान ("वन") आणि शंकरी ("शिवाची पार्वती"). तीळकरण्य जंगलात स्थित असल्यामुळे हे मंदिर वानशंकरी म्हणून लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की बनशंकरी हा योद्धा-देवी दुर्गाचा सहावा अवतार आहे. मंदिर सुरुवातीला द्रविडच्या स्थापत्य शैलीत बांधले गेले. पुनर्निर्मित संरचना विजयनगर वास्तुशास्त्रीय शैलीत आहे. मंदिराच्या बाजूला सर्व बाजूंनी एक उंच भिंत आहे. देवी देशस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. (संदर्भ: विकिपीडिया).
मंदिर पाहून एक फेरफटका मारला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या स्टॉल वर नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेतला. डॉक्टर धुमाळांनी स्वतः तळून एक भजी प्लेट सर्वाना सर्व्ह केली. रात्रीचे व्हेज जेवण (व्हेजच मिळते इथे) खाल्ले आणि उद्या सकाळी ६ वाजता तयार व्हायचंय असे सर्वाना सांगून टाकले. निद्रादेवीच्या खुशीत स्थिरावून हंपी - बदामी ट्रीपच्या पहिल्या दिवसाची सांगता केली.
भक्त निवासाच्या खोलीत मोबाईलच्या अलार्मने निद्रेची तपस्या भंग झाली. दांडग्या अनुभवामुळे सहाचा वेळ दिल्यावर साडे सात पर्यंत सर्व तयार झाले. आधी पोटोबा मग विठोबा ह्या तत्वावर नाश्ता झाला. बनपाव आणि चहा पुरवता पुरवता हॉटेल मालकाची लादी झाली. सगळं आवरून बदामी केव्ह्ज गाठण्याआधी एका ठिकाणी रात्री फिरताना रोषणाई केलेले एक ठिकाण दिसले होते ते सकाळी पाहू म्हणून आधी मोर्चा तिकडे वळवला. सकाळच्या पारी लोटा घेऊन जाणारेऱ्या महाभागांनी वरती काही नाही असे सांगत होते. आता आलोच आहे तर जाऊन येऊ म्हणून मी भरभर त्या पायऱ्या चढून एका खिंडीत गेलो. चारी बाजूला तांबड्या रंगाच्या महाकाय शिळामधून एक मध्ये क्रॉस होता त्याच्या एका घळीत कोण्या एक देवतेचे साधे मंदिर होतं. ते पाहून आजूबाजूला फारसे काही नसल्यामुळे काढता पाय घेतला. मी उतरत असताना मागून डॉक्टर धुमाळ - अभिजित - चैतन्य - राहुल आले. थोडीशी स्वतःचीच फोटोग्राफी उरकून बदामी गुहेजवळच्या पार्किंगला पोहचायला ९ वाजले.
तिकिट्स काढून एक एक गुहा पाहण्यास सुरवात केली . शाळेच्या मुलांच्या सहलीची भीती होती कारण त्याचा अनुभव काल बनशंकरी मंदिरात घेतला होता. सकाळची वेळ असल्याने गर्दी फार नव्हती. कॅमेरे सरसावले.
बदामी ही चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे ठिकाण. या राजवटीचा काळ इसवी सन 6 वे ते 8 वे शतक असा होता. पुलकेशी 2 हा चक्रवर्ती सम्राट या राजकुळातील एक पराक्रमी राजा . या ठिकाणाचे आधीचे नाव वातापि असे होते.. वातापि गणपती या नावाने एक प्रसिध्द गणपती तामिलनाडू राज्यात तंजावर येथे आहे. दक्षिण भारतात सकाळी म्हण्टल्या जाणा-या स्तोत्रात या गणपतीबाबत "वातापि गणपति भजे"" असा उल्लेख आढळतो . (संदर्भ: pragatishirgav :संजय पवार) भल्या मोठ्या शिळखंडात कोरलेल्या टेकडीवर पाषाणात ही लेणी कोरलेली आहेत .
भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल केली जात असलेल्या या भागाचे एकूण तीन भाग करता येतील. एक चालुक्य कालीन लेण्या, दुसरा भाग अगस्ती तलाव व भूतनाथ मंदिर समूह आणि तिसरा म्हणजे बदामी किल्ला. अशी एकंदरीत बदामी भटकंती व्यापलेली आहे. बदामी या लेण्यांकडे काही पाय-या चढून आलो . एका अखंड डोंगरात खोदकाम करून ह्या लेण्या तयार करण्यात आल्या आहेत. एकूण ४ लेण्या असलेल्यापैकी लेणी क्रमांक 1 मध्ये शिव व इतर हिंदु देव देवता, लेणी क्रमांक 2 व 3 मध्ये विष्णु व विष्णुचे विविध अवतार तसेच रामायण काळातील प्रसंग व यक्ष किन्नर, नर्तकी असे दाक्षिणात्य पद्धतीच्या मुर्ती खांबावर, दर्शनी भिंतीवर तसेच खांबाला आधार देणा-या तुळया व छत यावर कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक 4 मध्ये जैन शिल्पे आहेत.
इतका काळ लोटल्यावर आजही इथली मूर्तिकला आणि त्या शिल्पकारांचे कौशल्य अबाधित आहे. नटराजाची शिल्पे विशेष भाव खाऊन जातात. बदामीची लेणी व त्याचे स्थापत्य अप्रतिम आहे. दगडांचा रंग, लेण्यांची कलाकुसर, वरून दिसणारा विस्तीर्ण अगस्ती तलाव असं सारं दृश्य मनाला मोहवतं.
आता बदामी भटकंतीच्या दुसऱ्या भागात प्रवेश करताना विस्तीर्ण अशा अगस्ती तलावाला बगल देत भूतनाथ मंदिराकडे निघालो. पाणी कमी असल्याने काठाकाठाने आणि मग वाळूत रुतत - रुतत मंदिर गाठले. भूतनाथ हे शंकराचे नाव. (बच्चनच्या चित्रपटातले नव्हे.) हा मंदिर समूह सुंदर देवालये व स्वच्छ परिसर यामुळे विलोभनीय वाटतो.
बदामी किल्याच्या दिशेने जाताना एक पुरातत्व विभागाने संग्रहालय उभारले आहे. परिसरात मिळालेली अप्रतिम कलाकौशल्याची शिल्पे इथे एकत्रित करून ठेवली आहेत. दर्शनी भागात ठेवलेले शिल्प "क-मा-ल" आहे. ह्याची मागची पुढची बाजू एकदम समांतर कोरली आहे. लज्जागौरीचही कोरीव शिल्प अचंबित करते.
किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून वाट उजवीकडे वर सरकत जाते. इथं तुमच्या अंगातला ट्रेकर बाहेर येतो. भल्या मोठ्या उंचीच्या शिलाखंडांना वळसा देत किल्याच्या मुख्य दरवाजातून वाट आत येते. सह्याद्रीतल्या किल्यासारखाच इथला दरवाजा खुबीने बसविला आहे. त्यासाठी नैसर्गिक रचनेचा जास्तीत जास्त वापर केल्याचं दिसून येते. मागोमाग चारही दरवाजे तिथल्याच पाषाणांचा फायदा घेऊन बनविले आहेत. दरवाज्यांच्या बाजूने आक्रमण करून किल्ला जिंकणे केवळ अशक्य आहे.
चालुक्य राजघराण्याने येथे इसवी सन पाचवे शतक ते नववे शतक या दरम्यान बदामी येथे राज्य केले होते . बदामी येथे राजधानी करण्यापूर्वी ऐहोळ येथे त्यांची राजधानी होती.
तटबंदी, दोन शिवालये, बुरुज, दरवाजे, मनोरे अश्या सुरेख अवशेषांनी सजलेला स्वच्छ किल्ला. साडे अकरा वाजून गेले होते. आता थोडं-थोडं ऊन लागायला सुरवात झालेली. मधेच उगवलेली काटेरी झुडुपे शाळा सुटल्यावर मैदानात उगीच रेंगाळणाऱ्या पोरांसारखी भासत होती. घडाळ्यातला नियोजनाचा काटा पुढे सरकू नये म्हणून किल्ला उतराई पार्किंगकडे येताना एका गावात घुसलो, मंदिर समूह आणि येथील गावाची स्वच्छता ह्यात कमालीचा फरक होता. गाववाल्यांना आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या बाजूला राहतोय ह्याची चुकूनही जाणीव नव्हती. तरीसुद्धा काल केलेले बनशंकरी मंदिराजवळचे ते आमचं अविस्मरणीय वास्तव्य, आज दुपार पर्यंतच्या बदामीच्या त्या पवित्र वातावरणातील भटकंतीचे मोल तिळमात्रही कमी झाले नव्हते. मोठं मोठ्या शिळा कोरून त्यात गुंफा तयार करणे, विविध शिल्पाकृती साकार करणे ही एक स्थापत्य कलाच होय. या स्थापत्य कलेला कल्पक शिल्पकलेची जोड देऊन फार मोठा कलात्मक वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवला आहे. हंपी बदामी या वारशाच्या बाबतीत खरोखरीच भाग्यशाली होय. आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन.
_________________________________________________________________________________
_________________________________________________________________________
पुरातत्वीय काही खजिना त्याच सोनेरी झळाळीने कित्येक काळ तसाच रहावा असे बऱ्याच वेळा वाटते पण आधीच्या दिग्गजांनी ह्या विषयी लिहले नसते तर आपण आज ह्या ठिकाणी नसतो, त्यामुळे भ्रमंतीची जाण असलेल्या आणि आपल्या प्रवासावर नितांत प्रेम करणाऱ्या समस्त घुमक्कडांना आपले अनुभव सांगितल्यास त्या भटक्याच्या मनात, ज्ञान वाटणारा एका वेगळ्या उंचीवर पोहचेल. आपण कमावलेलेल्या मौल्यवान ज्ञानाचा, आपल्या भटकंतीचा आणि अनुभवाचा कधीही गर्व नसावा.
शहाणे करुन सोडावे, सकळजन।
_________________________________________
महत्त्वाच्या नोंदी :
उत्तम कालावधी : उन्हाळा सोडून कधीही.
दिनांक : २९-३०-३१ डिसेंबर २०१८
आजची भटकंती: आदल्या रात्री बनशंकरी मंदिर आणि वास्तव्य. दुसऱ्या दिवशी एक अनामिक मंदिर - बदामी गुहा - भूतनाथ मंदिर समूह - बदामी किल्ला
लागलेला वेळ : चार ते ५ तास
पाण्याची व्यवस्था : सोबत पाणी असावे.
कसे जाल : पुणे सोलापूर हा मार्ग गुगल मॅप दाखवत असेल किंवा कमी किमी भरत असेल तरी एन एच ४ ने जाणे सोईचे पडते. संपूर्ण प्रवास - निवास - भोजन व्यवस्था ह्याविषयी अखेरच्या भागात लिहेन.
हे चुकवू नका : बदामी किल्ल्याच्या पायथ्याचे संग्रहालय.
अडचणी : सारखी सारखी मंदिरच पाहावी लागतात त्यामुळे एखादा नास्तिक प्राणी सोबत असल्यास तो त्रास देऊ शकतो.
थोडक्यात महत्त्वाचं : प्रत्येकाच्या बकेट ;लिस्ट मध्ये हे ठिकाण असावे.
गाईड मिळतात. आम्ही गाईड न घेतल्यामुळे त्याचा अनुभव नाही.
सहभागी : डॉ. सुनील धुमाळ, अभिजित शिंदे, चैतन्य, राहुल सावंत, पल्लवी सावंत, ख़ुशी कांबळे आणि देवा घाणेकर.
बदामी - पट्टडकल - ऐहोले - विजयपुरा
https://www.misalpav.com/node/15090
मला खूप काहि माहिती नाही पण हे ठीकाण सुंदरच आहे. बदामी -ऐहोळे च्या मार्गावर आहे. बदामी -ऐहोळे पेक्षा जास्त सुस्थितीत आहे. क्षेत्रफळ जरी कमी असले तरी जास्त रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे.
स्थिरचित्रबदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
प्रास्ताविक
कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनाही शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं. ऑल टाइम फेव्हरेट गोवा, कर्नाटकातले भद्रा व्याघ्र अभयारण्य, यवतमाळनजीकचे टिपेश्वर आणि बदामी. गोवा खूपदा झाल्याने साहजिकच मागे पडलं, भद्रा आणि टिपेश्वर तुलनेने लांबचे आणि शक्यतो डिसेंबरमध्ये वातावरण कितीही आल्हाददायक असलं तरी ह्या काळात शक्यतो वाघ दिसण्याचे प्रमाण कमी असते म्हणून ही दोन्ही ठिकाणे उन्हाळ्यासाठी ठरवली आणि शेवटी उरलं ते बदामीच. एकतर बदामी उन्हाळ्यात खूप तापतं, शिवाय पायपीटही बदामीला बर्यापैकी आहे, शिवाय तिघांपैकी कुणीही बदामीला अजून गेलं नव्हतं त्यामुळे बदामी एकमताने फायनल झालं. मग आता त्यादृष्टीने राहाण्याच्या ठिकाणाचं बुकिंग करायचं ठरवलं. कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचा हंपी येथील अनुभव उत्तम असल्याने फारसा विचार न करताच मेकमायट्रिपवरुन मयुरा चालुक्य बदामी येथे ३ रात्रींसाठी बुकिंग केलं. सेमी डिलक्स नॉन एसी तिघांसाठी मिळून ३ रात्रींसाठी ७००० रु. पडले. वास्तविक बदामीस क्लार्क्स इन, बदामी हेरीटेज, बदामी कोर्ट अशी उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत मात्र ती तुलनेने महाग, तर बसस्टॅण्डच्या आसपास भरपूर लॉजेस आहेत ती तुलनेने खूपच स्वस्त, मात्र पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मयुरा चालुक्य तसं गर्दीपासून दूर, शांत, पार्किंग प्रशस्त आहे, मात्र चांगले असूनही मेन्टेनन्स आणि सर्व्हिसची तुलनेने बोंबच आहे ते एक असो. काय काय बघायचे, कसे कसे बघायचे ह्याबाबत कंजूसकाकांशी फोनवर सतत चर्चा चालू होत्याच. त्यांच्या मार्गदर्शनाबद्द्ल त्यांचे आभार न मानणे हे कृतघ्नपणाचेच ठरेल.
नियोजन केले ते असे.
२ डिसेंबर - कोल्हापूर मुक्काम
३ डिसेंबर- बदामी चेक आणि बदामी लेणी दर्शन
४ डिसेंबर - ऐहोळे, पट्टदकल
५ डिसेंबर - बदामी किल्ला, भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, महाकूट समूह आणि बनशंकरी.
ह्या पाच डिसेंबरच्याच दिवशी सिडीलापडीच्या रूपाने एक अनपेक्षित लाभ झाला. वेळेअभावी हे ठिकाण खरं तर टाळणार होतो पण ते वेळेत बसवलेच, त्याबद्द्ल नंतर लिहिनच.
६ डिसेंबर - परतीचा प्रवास
तर २ तारखेला ऑफिसमधून लवकरच बाहेर पडलो आणि साधारण दुपारी पावणेचारच्या आसपास पुणे सोडले. बदामीला जाण्यासाठी पुण्यातून दोन प्रमुख मार्ग आहेत. एक जातो तो सोलापूर, विजयपूर-बदामी आणि दुसरा आहे तो कोल्हापूर - निपाणी - संकेश्वर - गोकाक - रामदुर्ग - बदामी. आम्ही कोल्हापूरवरुन जाण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने हॉटेल ओपलला अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते. साडेसात/आठच्या आसपास ओपलला पोहोचलो, रूमवर बॅगा टाकून लगेचच रिक्षाने महालक्ष्मी मंदिरात गेलो, दर शुक्रवारी देवीच्या पालखीचा सोहळा मंदिरात असतो तो यावेळी प्रथमच बघायला मिळाला. मग रात्री निवांत ओपललाच जेवण केले आणि राऊंड ऑफ १६ मधील एक फूटबॉल वर्ल्ड कप मॅच पाहता पाहता झोपी गेलो. सकाळी ओपलचा नाष्टा ८ वाजताच सुरु होतो, कोल्हापूरपासून बदामी साधारण २२० किमी आहे आणि आमचे बदामीचे चेक इन देखील दुपारी एक वाजता असल्याने पुरेसा वेळ हाती होताच. नाष्टा करुन साधारण ९ च्या आसपास कोल्हापूर सोडले ते निपाणी, संकेश्वर, गोकाक (अर्थात हे सर्वच रस्ते गावात न जाता बाहेरुन जातात) करुन साधारण दीडच्या आसपास मयुरा चालुक्य येथे चेक इन केले. रूम अगदी प्रशस्त असून ३ सिंगल बेड आहेत, शिवाय सोलर सिस्टम असल्याने गरम पाणी २४ तास उपलब्ध असते. थोडं फ्रेश होऊन तिथेच जेवण केले. चालुक्य रेस्टोरंटची सर्व्हिस मात्र खूप स्लो आहे. पावणेतीन्/तीन पर्यंत जेवण उरकले. आता आजचा प्लान होता बदामीच्या गुहा पाहणे. संपूर्ण बदामी गावाच्या पाठीमागेच बदामीचा बदामी रंगाचा डोंगर एखाद्या खडा पहारा देत उभा आहे. डोंगरावरील शिवालये, बुरुज कोठूनही स्पष्ट दिसतात. गुहांच्या इथेच गाड्यांसाठी वाहनतळ आहे. हॉटेलपसून पाच सात मिनिटातच वाहनतळावर पोहोचून वाहन लावले आणि तिकिट काऊंटर तिकीट काढून (२५ रु. प्रत्येकी) बदामीच्या गुहा पाहण्यास निघालो. मात्र बदामीच्या गुहा पाहण्याआधी आपल्याला बदामीच्या चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास
इ.स.सहाव्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत एका शक्तिशाली राजघराण्याचा उदय झाला. ते घराणे म्हणजे बदामीचे चालुक्य. बदामीचे पूर्वीचे नाव वातापी. इल्वल आणि वातापि हे दोघे राक्षसबंधु. इल्वल आलेल्या अतिथींना आग्रहाने भोजनास बोलवत असे आणि वातापि हा मेढ्यांचे रूप घेऊन अतिथींच्या पानात मांसाच्या रूपाने जात असे आणि अतिथींचे जेवण झाल्यावर त्यांचे पोट फाडून परत जीवंत बाहेर येत असे. एकदा अगत्स्य ऋषी तेथून जात असता इल्वल मानभावीपणाने त्यांना जेवायला घेऊन गेला, ऋषींनी वातापिरुपी मांसान्न खाल्यावर इल्वलाने वातापि, बाहेर ये अशी हाक मारली असता तो बाहेर आलाच नाही, अगत्स्याने वातापिला पचवून टाकले आहे हे ओळखून इल्वल त्यांना शरण गेला आणि त्याने ते ठिकाण कायमचे सोडले. हे जे ठिकाण आहे तीच बदामी, अर्थात चालुक्यांची राजधानी वातापी. उत्तर चालुक्यांच्या लेखात चालुक्य ह्या संज्ञेविषयी काही आख्यायिका आहेत. हे चलिक्य किंवा चलुक्य नावाच्या प्रदेशातले होते किंवा साळी हे त्यांचे कुल होते. ह्यावरुन त्यांचे चालुक्य हे कुलनाम आले असावे असा एक तर्क आहे.
चालुक्य हे सुरुवातीला बनवासीच्या कदंबाचे सरदार होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्या घराण्याचा पहिला पुरुष जयसिंह हा होता. जयसिंहाचा पुत्र रणराग आणि त्याचा पुत्र पुलकेशी (पहिला). पुलकेशीने बनवासीच्या कदंबांना हरवून वातापी नामक राजधानीची निर्मिती केली. पुलकेशीने अश्वमेध व इतर अनेक यज्ञ केले व हिरण्यगर्भ नामक दान दिले असा ऐहोळे प्रशस्तीत उल्लेख आहे.
तस्याभवत्तनूजः पोलेकेशी यः श्रीतेन्दुकान्तिरिप।
श्रीवल्लभोप्ययासीद्वातापिपुरीवधूवरताम्॥
यस्त्रिवर्ग्गपदवीमलं क्षितौ नानुगन्तुमधुनापि राजकम्।
भूश्व येन हयमेधयाजिना प्रापितावभृथमज्जना बभौ॥
चंद्राच्या कांतीसमान असलेला श्रीवल्लभ पुलकेशी हा (रणरागाचा) पुत्र असून वातापिरुपी वधू त्याने वरली होती. त्याने राजांना अप्राप्य असलेली त्रिवर्ग हे बिरुद धारण केले होते आणि अश्वमेध यज्ञ करुन अवभृत स्नान करुन सर्व लोकांना आश्चर्यचकित करुन सोडले होते.
पहिल्या पुलकेशीने आपल्या सार्वभौमत्वाचे द्योतक म्हणून त्याच्या पूर्वीच्या राजांच्या "राजन्" आणि "नृप" अशा साध्या विरुदाऐवजी "महाराज" हे बिरुद धारण केले. तसेच त्याने सत्याश्रय, रणविक्रम आणि श्रीपृथ्वीवल्लभ अशी विरुदेही धारण केली. त्याने इ.स. ५३५ ते ५६६ पर्यंत राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर कीर्तिवर्मन(पहिला) हा राज्यावर आला. पुलकेशीचा दुसरा पुत्र मंगलेश, हादेखील महापराक्रमी होता. मंगलेशाच्या महाकूट येथील स्तंभलेखात किर्तीवर्मनाने अंग, वंग, कलिंग इत्यादी जिंकलेल्या प्रदेशांची नावे दिली आहेत. त्याने आपल्या राज्याचा पुष्कळ विस्तार केला. ह्या किर्तीवर्मनचा पुत्र पुलकेशी (दुसरा). हा पुलकेशी चालुक्य वंशातील सर्वात महापराक्रमी राजा. मात्र किर्तीवर्मनच्या मृत्युप्रसंगी पुलकेशी अल्पवयीन असल्याने मंगलेश हा राजा झाला. ह्या मंगलेशाने कलचुरींवर आक्रमण करुन त्यांना जिंकले आणि नंतर पश्चिम किनार्यावरील रेवतीद्विपावर स्वारी करुन ते द्विप जिंकले. ह्या रेवतीद्विपाबद्द्ल काही मतभेद आहे. कुणी म्हणतात ते कोकणातले रेडी असावे किंवा रेवदंडा असावे तर कोणी हे गोवे असावे असे म्हणतात कारण कदंब त्याकाळी क्षीण झाले होते. मात्र हे रेवतीद्विप कोकणच्या मौर्यांकडून त्याने जिंकून घेतले असे शिलालेखात स्पष्ट उल्लेख असल्याने हे कोकणातलेच कुठलेतरी ठिकाण असावे असे मानता यावे. ह्या मंगलेशाला मात्र आपल्या मुलांसाठी सत्तेचा मोह सोडवेना झाला आणि त्याने पुलकेशी (द्वितीय) ह्याचा वारसा हक्क नाकारला आणि यातूनच पुलकेशी आणि मंगलेश यामध्ये ठिणगी पडली ज्याचे पुढे अग्नीत रुपांतर होऊन मंगलेशाला सत्ता आणि आपले प्राणही गमवावे लागले.
ऐहोळे प्रशस्ती म्हणते
तस्याग्रजस्य तनया नहुषानुभावे लक्ष्म्या किलभिलषिते पोलकेशिनामम्नि।
सासूयमात्मानि भवन्तमतः पितृव्यम् ज्ञात्त्वापरुद्धचरितव्यवसायबुद्धौ॥
स यदुपचित मन्त्रोत्साहशक्तिप्रयोग क्षपितवलविशेषो मङ्गलेशः समन्तात्।
स्वतनयगताराज्यारम्भयत्नेन साद्धं निजमतनु च राज्यंञ्जीवितंञ्चोज्झति स्म॥
त्याच्या (मंगलेशाच्या) भावाचा (किर्तीवर्मन) पुत्र पुलकेशी होता जो नहुषासमान असून लक्ष्मीला प्रिय होता. पित्यासमान असलेल्या मंगलेशाने आपली सारासारविवेकबुद्धी सोडून पुलकेशीविरुद्ध विपरीत आचरण केले त्यामुळे त्याने (पुलकेशीने) आपल्या मंत्र, उत्साह आणि बलप्रयोगाने मंगलेशाचे बळ नष्ट करुन टाकले. आपल्या पुत्रासाठी झालेल्या सत्तामोहामुळे मंगलेशाला राज्यासकट जीवीतही गमवावे लागले.
पुलकेशी आणि मंगलेशातील या संघर्षामुळे अराजक माजले होते. त्यांचे शत्रू, सामंत, मांडलिक, इतर सरदार घराणी ह्या अराजकाचा फायदा न घेते तरच नवल.
तावत्तच्छत्रभङ्गो जगदखिलमरात्यन्धकोरापरुद्धं यस्यासह्यप्रद्युतिततिभिरिवाक्क्रान्तमासीत्प्रभातम्।
मंगलेशाच्या अंतानंतर संपूर्ण जग शत्रूरूपी अंधःकाराने व्याप्त झाले होते मात्र पुलकेशीच्या प्रचंड प्रभावाने पुन्हा पहाटेचे आगमन झाले.
या सर्व शत्रूंचा पराभव करुन पुलकेशीने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्याने वनवासीवर स्वारी करुन कदंबांना पुन्हा जिंकले आणि गंग आणि अलूपवंशीयांना धडा शिकवला. नंतर कोंकण मौर्यांना हरवून त्यांची राजधानी पुरी (घारापुरी) जिंकली. त्यानंतर पुलकेशी लाट, सौराष्ट्र आणि माळवा आपल्या अधिपत्याखाली घेतले आणि त्यानंतर सम्राट हर्षवर्धनावर विजय मिळवला व त्याला नर्मदेपलीकडे माघार घ्यावयास भाग पाडले.
अपरिमितविभूतिस्फीतसामन्तसेना मुकुटमणिमयूखाक्क्रान्तपादारविन्दः।
युधि पतितगजेंद्रानीकबीभत्सभूतो भयविलगित हर्षों येन चाकारि हर्षः॥
अपरिमित ऐश्वर्याने युक्त असलेल्या विभूतीसमान सामंतांच्या मुकुटमण्यांनी युक्त असलेला हर्ष सुद्धा त्याचे प्रचंड गजसैन्य नष्ट झाल्यामुळे अहर्ष (दु:खी) होऊन गेला.
यानंतर पुलकेशीने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला. ऐहोळे प्रशस्तीत महाराष्ट्र या नामाचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो असा.
विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पस्तिसृभिरपि गुणौधैस्वैश्च माहाकुलाद्यैः।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्टकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणाम्॥
आपल्या विविध गुणांनी आणि कुलिनतेने इंद्रासमान असलेल्या पुलकेशीने तिन्ही महाराष्ट्र प्रदेशांवर त्यातील ९९००० गावांसह स्वामित्व प्राप्त केले.
त्यापाठोपाठ पुलकेशीने कोसल आणि गंगांचा पराभव केला, आणि आंध्र जिंकले, लगोलग त्याने चोल आणि पांड्यांशी मैत्री संपादन करुन पल्लवांवर स्वारी केली. त्याला कांची जिंकता आली नाही मात्र पल्लवांचे साम्राज्य बरेच खिळखिळे झाले. इ. स. ६४२ मध्ये आपल्या पित्याच्या पराभवाचा सूड घेण्याच्या दृष्टीने महेंद्रवर्मन याचा उत्तराधिकारी पहिला नरसिंहवर्मन याने अचानकपणे चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. हा हल्ला एवढ्या तडकाफडकी करण्यात आला की, त्यात पुलकेशी देखील बेसावध अवस्थेत पकडला गेला. पल्लव सैन्याने चालुक्यांचा प्रदेश पादाक्रांत करून वातापीस वेढा टाकला. पुलकेशीने सैन्याची जमवाजमव करून राजधानी वाचविण्यासाठी प्रखर प्रतिकार केला. परंतु या लढाईत स्वतः पुलकेशी मारला गेल्यामुळे युद्धाचे पारडे पल्लवांच्या बाजूने झुकले. नरसिंहवर्मनने वातापीचा जिंकली आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने "वातापीकोंडा" हे विरुद धारण केले व या पराक्रमाचे स्मारक म्हणून वातापी येथील प्रस्तरावर आपल्या राजाज्ञेचा शिलालेख कोरविला. चालुक्य वंशातील सर्वश्रेष्ठ आणि प्राचीन भारतातील श्रेष्ठ असलेल्या पुलकेशीचा असा दुर्दैवी अंत झाला.
त्यानंतर १२/१३ वर्षे चालुक्यांसाठी कसोटीची ठरली, त्याच्या पुत्रांमध्येही बेदिली माजली, त्यानंतर त्याचा पुत्र विक्रमादित्य हा सत्तेवर आला. आपला भाऊ आदित्यवर्मन आणि त्याचा पुत्र अभिनवादित्य ह्यांचा पराभव करुन वातापीवर आपला ताबा पुनःस्थापित केला आणि राज्य स्थिरस्थावर झाल्यावर आपले परंपरागत शत्रू असलेल्या पल्लवांवर मोर्चा वळवला. पल्लव प्रदेश व्यापून व कांची शहर जिंकून वातापीच्या पाडावाचा व पुलकेशीच्या मृत्यूचा पूर्ण बदला घेतला. विक्रमादित्याच्याच काळात चालुक्यांच्या प्रदेशात शांततेचे युग सुरु झाले आणि पट्टदकल येथील मंदिरांची उभारणी सुरु झाली. ६८१ मध्ये त्याच्या मृत्युनंतर युवराज विनयादित्य हा सत्तेवर आला. हाही पित्यासमान पराक्रमी होता. पल्लव पाण्ड्य, चोल, केरळ, कलभ्र, हैहेय, विल, मालव, अलूप व गंग इत्यादी अनेकांचा याने पराभव केला. कनोजच्या यशोवर्मनशी चालुक्यांचा संघर्ष होऊन त्यात विनयादित्याची अखेर झाली व विजयादित्य सत्तेवर आला. ह्याची कारकिर्द प्रदीर्घ आणि शांततेची ठरली.
विजयादित्यानंतर इस ७३३ साली विक्रमादित्य (द्वितीय) हा सत्तेवर आला. ह्याच्या कारकिर्दित पुन्हा पल्लवांविरुद्धच्या लढाईला तोंड फुटले. पल्लवांचा पराभव करुन याने पांड्य, चोल, केरळ आणि कलचुरींचा पराभव केला आणि हिंदी महासागराच्या तीरावर विजयस्तंभ उभारला. याच्यानंतर इसवी ७४५ मध्ये त्याचा पुत्र किर्तीवर्मन (द्वितीय) सत्तेवर आला. मात्र आता मांडलिक सत्ता प्रबळ होऊ लागल्या होत्या, मान्यखेतच्या राष्ट्रकूटांनी त्यांना आव्हान दिले. कर्क राष्ट्रकूटाने चालुक्यांचे राज्यादेश झुगारुन स्वतंत्र शासन जारी केले. वेरुळ लेण्यात शिलालेख असणार्या दंतिदुर्गाने किर्तीवर्मनचा पराभव करुन महाराष्ट्र आणि कोंकण जिंकले आणि राष्ट्रकूटांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली आणि इसवी सन ७५० साली वातापीचे राज्य खालसा झाले.
अर्थात राष्ट्रकूटानंतर परत बदामीच्या चालुक्यांच्या दोन शाखा पुन्हा उदयाला आल्या. ते स्वतःस बदामीच्या चालुक्यांचे वंशज म्हणवून घेत. एक शाखा आंध्रप्रदेशाच्या समुद्रकिनार्यानजीक असलेल्या वेंगी येथे राज्य करु लागली ते म्हणजे वेंगीचे अथवा पूर्वेचे चालुक्य आणि दुसरी शाखा दक्षिण कर्नाटकातील बसवकल्याण येथून राज्य करु लागली ते म्हणजे कल्याणीचे चालुक्य. हे कल्याणीचे चालुक्यही महापराक्रमी होते. अर्थात विस्तारभयास्तव त्यांच्याबद्द्ल येथे अधिक लिहिणे शक्य नाही.
येथे आपण चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेतला आहे. चालुक्यांनी कित्येक शिलालेख, प्रशस्ती कोरवल्यामुळे त्यांच्याबद्द्ल इतिहासात विपुल माहिती उपलब्ध आहे. ह्याच बदामीच्या चालुक्यांच्या कालखंडात बदामीच्या लेण्यांची निर्मिती झाली, बदामीची मंदिरे, ऐहोळे, पट्टदकल, महाकूट यांसारख्या असंख्य मंदिर समूहांची निर्मिती झाली आता त्यांच्याबद्दलच आपण एकेक करुन जाणून घेऊयात. सर्वप्रथम जाऊ बदामीची लेणी पाहायला.
बदामीची लेणी
बदामीच्या लेण्यांकडे जाताच आपली नजर फिरते ती तिथल्या भव्य कड्यांभोवती. निव्वळ अद्भूत आहे हे सर्व. एखाद्याला मानवनिर्मित कलेची आवड नसेल तरीही तो निसर्गाच्या निर्माण केलेल्या कलेत ह्या कलेत रममाण होणार यात यत्किंचितही शंका नाही. वाहनतळातूनच आपल्या पहिल्या लेणीचे दर्शन होते. बाजूच्याच अंगावर येणार्या प्रचंड कड्यातूनच पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण केला आहे.
लेणी क्र. १
हे लेणे शैव आहे. साधारण सहाव्या शतकाच्या सुरुवातीचे हे लेणे असावे. उभ्या कड्यात आयताकृती आकारात खोदून हे लेणे तयार केले असून चार स्तंभांवर तोललेले आहे. मुखमंडप (व्हरांडा) त्याच्या बाजूला एक अर्धमंडप, पुढे सभामंडप व त्यापुढे गुहेच्या सर्वात शेवटी गर्भगृह अशी याची रचना.
लेणी क्र. १ चे मुखदर्शन
ह्या लेणीच्या व्हरांड्यात नटराजाची अप्रतिम मूर्ती असून बाजूच्या त्यावर असलेल्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेयाची मूर्ती आहे.
नटराज
१८ हातांचा हा नटराज अतिशय सुंदर असून ह्याच्य नृत्यमुद्रा सुमारे ८१ होतात. डाव्या बाजूस नंदी व बाजूस नृत्यगणेश असून एक सेवक तालवाद्य वाजवत आहे.
व्हरांड्याची आतील बाजूस महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेय आहेत.
महिषासुरमर्दिनी
मोरावर आरुढ कार्तिकेय
व्हरांड्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूस आहे हरिहर तर उजव्या बाजूस आहे अर्धनारीश्वर
हरिहर
हे एक जबरदस्त सुंदर शिल्प आहे. शैव आणि वैष्णवांमधला संघर्ष मिटवण्याच्या दृष्टीने या दोन देवतांना एकत्र आणून हरिहराच्या रूपाने ह्यांचे संयोजन करण्यात आली. ह्या शिल्पात असंख्य बारकावे आहेत. अर्धी बाजू शैव तर अर्धी वैष्णव असल्याने दोन्ही देवतांच्या विविध लक्षणांचे येथे सुंदर दर्शन होते. विष्णूचा मुकुट हा भरजरी आहे तर शिवाच्या जटायुक्त असून त्यात अर्धचंद्र आहे. विष्णूचा बाहू दागिन्यांनी युक्त असून शिवाने आपल्या बाहूत नाग धारण केला आहे. विष्णूचे कटिवस्त्र भरजरी असून शिवाने गजचर्म परिधान केले आहे. विष्णूने आपल्या हातात शंख आणि पद्म धारण केले असून शिवाच्या हाती नाग आणि त्रिशूळ आहे. विष्णूच्या बाजूस त्याचे वाहन गरुड असून शिवाकडे त्याचे वाहन नंदी आहे. विष्णूच्या बाजूस लक्ष्मी असून शिवाच्या बाजूस पार्वती आहे.
ह्याच्या समोरील बाजूस आहे अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर
हेही येथील एक अत्यंत देखणे शिल्प. पुरुष आणि प्रकृतीचे मिलन या शिल्पाद्वारे दाखवले जाते. अर्धी बाजू शिवाची तर अर्धी पार्वतीची.
पार्वतीने केस शृंगारले असून शिवाचे जटायुक्त आहेत व त्यात अर्धचंद्र आहे. पार्वतीने हातात कमळ तर शिवाने हातात त्रिशूळ धारण केला आहे. पार्वतीने साधेच पण नक्षीदार कटीवस्त्र परिधान केले आहे तर शिवाच्या कमरेला नागबंधन आहे. पार्वतीच्या हातात बांगड्या तर शिवाच्या हातात रूद्राक्षाची माळ आहे. पार्वतीने पायात पैंजण घातले असून शिवाचे पाय मोकळेच आहेत. पार्वतीच्या बाजूला करंडा घेतलेली सखीपार्वती असून शिवाच्या बाजूला परमभक्त भृंगी आहे व बाजूस नंदी हे वाहन उभे आहे.
हरीहर आणि अर्धनारीश्वर या दोन मूर्तीच्या मध्ये असलेल्या छतावर वेटोळ्यावर आरुढ झालेल्या नागराजाचे अप्रतिम शिल्प आहे जे चुकवू नये असेच. बदामी, ऐहोळे, पट्ट्दकल या भागातील लेणी, मंदिरे पाहताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे छताची आतील बाजू पाहाणे. येथील परिसरातील छतांवर देखण्या मूर्ती आहेत, नक्षीदार कलाकुसरी आहेत.
छतावरील भारवाहक यक्षही बघण्यासारखे आहेत.
आतमध्ये गाभार्यात शिवलिंग आहे, येथे आत वटवाघुळे मोठ्या संख्येने आहेत. नटराजाच्या समोरील बाजूस एका शैव द्वारपालाचे सुरेख शिल्प कोरलेले आहे. त्याच्या वरील बाजूस शिवपार्वती नंदीवर आरुढ झालेले आहेत तर खालील बाजूस बैल आणि हत्ती यांचे एकत्रित असे शिल्प आहे.
चला तर आता लेणी क्र. २ ला जाऊयात.
लेणी क्र. २
ह्या लेणीत जाताना बदामीच्या कड्यांचे सुंदर दर्शन होत राहते.
बदामीचे कडे
समोर दिसणारे वरचे शिवालय
हे लेणे वैष्णव असून याची रचनाही लेणी क्र. १ सारखीच आहे.
व्हरांड्यातील एका बाजूस विष्णूचा त्रिविक्रम अवतार तर आहे दुसर्या बाजूस विष्णूचा वराह अवतार आहे.
त्रिविक्रम अवतार
खालच्या बाजूला बटूरूपातील छत्रीधारी वामन उभा असून त्याच्या हातावर उदक सोडून तीन पावले मावतील इतकी भूमी देणार्या बळीराजाची मूर्ती कोरलेली आहे तर त्याच्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य उभा असून तो बळीला त्यापासून परावृत्त करतो आहे. पण बळीने अखेर दानाचे उदक सोडल्यावर विष्णूने आपले त्रिविक्रमाचे मूळ रूप प्रकट केले. एक पाय अतिशय उंच करून त्याने जणू स्वर्गच पादाक्रांत केला आहे तर दुसर्या पायाने त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकिली आहे आता जणू तो बळीला तिसरा पाय कुठे ठेऊ असे विचारत आहे. बळीचे सेवक त्रिविक्रमावर धावून जात आहेत तर गरुड एका पायाला धरुन बसला आहे.
त्रिविक्रम संपूर्ण पट
वामन, मध्ये शुक्राचार्य आणि वामनाला अर्ध्य देतांना बळीराजा
ह्याच्याच समोरील बाजूस वराह अवतार आहे. वराहाने आपल्या सुळ्यावर पृथ्वी तोललेली असून तो शेषनागावर आरुढ आहे तर बाजूलाच पृथ्वीचे हरण करणारा हिरणाक्ष्य राक्षस विष्णूस शरण जात आहे.
व्हरांड्यातील छतावर अप्रतिम कोरीवकाम असून चक्र, स्वस्तिकचिन्हरुपी भुलभुलय्यासारखी कमालीची मोहक नक्षी कोरलेली आहे. त्याच्या आजूबाजूस समुद्रमंथनासारखे देखावे आहेत.
छतावरील कोरीवकाम
छतावरच एका बाजूला गरुडारूढ विष्णूची मूर्ती कोरलेली आहे.
गर्भगृहात विष्णूपीठ असून त्यावरची मूर्ती मात्र आज नष्ट झालेली आहे.
लेणी क्र. २ आणि तीनच्या मध्ये वरच्या किल्ल्यावर जाणारा खोदीव प्रवेशमार्ग आहे तो मात्र आज पुरातत्व खात्याने बंद ठेवला आहे. येथे किल्ल्यावर जायचे असल्यास बनशंकरी रस्त्यवरुन एका पायवाटेने जाता येते.
लेणी क्र. ३
हे येथले सर्वात प्रचंड आणि भव्य लेणे. वरच्या स्तरात असलेल्या ह्या लेणीत जायचा मार्ग कातळातून खोदून काढला आहे. हेही लेणे महाविष्णूला समर्पित आहे. समोर भव्य प्रांगण, व्हरांडा, त्यातील स्तंभांवर कोरलेल्या सुरसुंदरी, वादकांची शिल्पे, दोन्ही बाजूस असणारे विष्णूचे अवतार, छतांवरील दिक्पाल, विस्तीर्ण सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना. केवळ ह्याच लेण्यात लेणी कोरल्याचा शिलालेख आहे. हे लेणे मंगलेशाने शके ५०० (इसवीसन ५७८) मध्ये कोरवून विष्णूस समर्पित केले अस सर्वसाधारण आशय.
लेणीत जायचा कोरीव जीना
लेणी क्र. ३ चे मुखदर्शन
मुखमंडप हा ६ पूर्णस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांवर तोलला गेलेला असून सर्व बाजूस कमालीचे देखणे मूर्तीकाम आहे.
मुखमंडपातील उजव्या बाजूस त्रिविक्रमाची मूर्ती कोरलेली असून त्याची रचना लेणी क्र. २ मधील त्रिविक्रमासारखीच आहे, मात्र येथील मूर्ती अधिक देखणी आणि अधिक भव्य आहे.
त्रिविक्रम
ह्याच्याच आतील बाजूस नृसिंहावताराची उभी मूर्ती कोरलेली आहे.
तर नृसिंहाच्या शेजारी हरिहर आहे.
नृसिंहाच्या बरोबर समोर अष्टभुज विष्णू असून मुखमंडपाच्या आतील बाजूस शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेला महाविष्णूची अतीव देखणी मूर्ती आहे. तर त्याच्या बाजूस वराहावतार आहे.
शेषावर बसलेला महाविष्णू
महाविष्णू आणि वराहावतार
मुखमंडपातील प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस गरुडाची अतिशय भव्य मूर्ती आहे जी अगदी आवर्जून पहावी अशीच. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात, इथे मात्र प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षच उत्कट असे म्हणावेसे वाटते. ह्या मूर्तीची भव्यता छायाचित्रात कदापिही येणार नाही.
गरुड
येथील छतांवर रंगीत नक्षीकाम आहे तर स्तंभशिल्पे देखणी आहेत. यातील एक विशेष शिल्प म्हणजे मद्याच्या नशेत चूर झालेली तरुणी आणि तिला सावरणार्या तिच्या प्रियकराचे शिल्प.
रंगांचे नमुने
मुखमंडप आणि सभामंडपातील छतांवर अष्टदिक्पाल, कार्तिकेय, ब्रह्मादिक देवता कोरलेल्या आहेत.
इंद्र
ब्रह्मा
शिव आणि वरुण
--
येथेही गर्भगृहात मूर्ती नाही.
लेणी क्र. ४
ह्याच्याच वरील बाजूस ही लेणी आहेत. चालुक्यांचे काही महाल जैन होते, तसेच जैन धर्मालाही त्यांचा उदार आश्रय होता. हे लेणे म्हणजे एक जिनालय आहे. खुला मुखमंडप, आयताकार सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. सातव्या शतकात कोरले गेलेले हे लेणे येथील सर्वात लहान लेणे असून आत जैन तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मुखमंडपातील आतल्या उजव्या बाजूस महावीरांचे गुरु पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे.
तर त्याच्या समोरील बाजूस बाहुबलीची सुबक मूर्ती कोरलेली आहे.
समोरील देवकोष्ठात तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ
येथीलच एका बाजूस महावीरांच्या बाजूस बसून संलेखना करणारी जैन साध्वी जक्कावे हीचे शिल्प कोरलेले आहे.
तर गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती आहे.
येथे आपले लेणीदर्शन समाप्त होते. आधी म्हटल्याप्रमाणे केवळ लेणीदर्शन हा हेतू न ठेवताही येथे येणार्यांसाठी निसर्ग आपले अनेक विभ्रम दाखवत असतो. बदामीचे भव्य कडे, त्यातून समोरच्या किल्ल्याचे होणारे दर्शन, खालील बाजूस असणारा नयनरम्य अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे केवळ अद्भुतरम्य.
अगस्ती तलाव आणि समोरील बाजूचे वरचे शिवालय आणि बदामीचा किल्ला
भूतनाथ मंदिराचे होणारे मोहक दर्शन
अगस्ती तलाव, वरचे शिवालय
निसर्ग आपले विभ्रम दाखवताना
सूर्य मावळतीला लागला आणि त्याच सुमारास चंद्र उगवू लागला. आम्ही बदामीच्या गुहा उतरुन वाहनतळानजीक आलो.
तिथून लगेचच मशिदीच्या बाजूने अगस्ती तलावावर गेलो. काठावर एक अत्यंत सुंदर मंदिर आहे. वेस्सर (द्राविड आणि नागरी मिश्र शैली) शैलीतील हे मंदिर कमालीचे देखणे आहे. मूर्तीकाम नाही.
मंदिराच्या पुढ्यातील अगस्ती तलाव व समोरील बाजूस असणारे भूतनाथ मंदिर
आता अंधार वेगाने पडू लागला होता व आमचे उद्याचे लक्ष्य होते ते ऐहोळे आणि पट्टदकल येथील मंदिरसमूह. सकाळी लवकरच निघायचे असल्याने रूमवर जाऊन जेवण करुन थोड्याफार गप्पा मारुन लगेचच झोपी गेलो.
अर्थात दुसर्या दिवशी जरी आम्ही ऐहोळेला गेलो असलो तरी लेखमाला भौगोलिक दृष्ट्या संलग्न व्हावी म्हणून आम्ही तिसर्या दिवशी केलेल्या बदामी लेण्यांच्या समोरील बाजूस असलेल्या खालचे आणि वरचे शिवालय, बदामी किल्ला आणि भूतनाथ मंदिराची सफर आधी सांगेन अणि मगच ऐहोळे-पट्टदकलविषयी लिहायला घेईन.
क्रमशः
यानंतर पुलकेशीने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला. ऐहोळे प्रशस्तीत महाराष्ट्र या नामाचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो असा.
विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पस्तिसृभिरपि गुणौधैस्वैश्च माहाकुलाद्यैः।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्टकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणाम्॥आपल्या विविध गुणांनी आणि कुलिनतेने इंद्रासमान असलेल्या पुलकेशीने तिन्ही महाराष्ट्र प्रदेशांवर त्यातील ९९००० गावांसह स्वामित्व प्राप्त केले.
ये बात कुछ हजम नही हुई ...
त्याकाळी ९९००० हजार गावे महाराष्ट्रात असतील का ?
आज सुद्धा महाराष्ट्रात तेव्हडी गावे नाहीत ...
By: Express News Service
Mumbai | December 12, 2020 6:27:47 am
NewsguardThe State Election Commission on Friday announced elections for 14,234 gram panchayats across 34 of Maharashtra’s 36 districts on January 15, 2021.
While nominations can be filed from December 23 to December 30, results will be declared on January 18, 2021. The model election code of conduct came into force immediately after the announcement.
Elections for 1,566 gram panchayats were slated to be held on March 31 but had to be postponed due to the Covid-19 pandemic.
There are 27,920 gram panchayats in Maharashtra and elections to 14,234 of them means nearly 50 per cent of the village bodies would go to polls next month.
हा आकडा अतिशयोक्त आहेच ह्यात काहीच शंका नाही, प्रशस्ती म्हणजे थोडीफार अतिशयोक्ती आलीच. अर्थात प्रस्तुत लेखातील ३ महाराष्ट्र कोणते याचा उलगडा आजतागायत पूर्णपणे झाला नाहीये. उत्तर कर्नाटक, मध्य व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मध्यप्रदेशातील मिळून तो भाग असावा असे ढोबळमानाने म्हणता येईल, आजच्या महाराष्ट्रातील सीमांशी प्रस्तुत लेखातील महाराष्ट्राशी तुलना करणे अयोग्य होईल.
शिल्पे काळी पडली नसून बदामीचे खडकात लाल, गुलाबी, पांढरा, पिवळ्या, करड्या, काळ्या, राखाडी अशा असंख्य रंगांच्या विविध छटा आहेत. त्यानुसार येथील शिल्पांचा रंग देखील बदलत असतो, शिवाय येथील काही शिल्पे ही अंधारात असून छायाचित्रेही केवळ मोबाईलवरच काढलेली आहेत त्यामुळेही ती काहीशी काळी दिसतात.
चालुक्यांचे आजचे वंशज, हे आजचे साळुंखे / सोळंकी / चाळके आहेत असे म्हटले जाते ...
तसेच मौर्यांचे मोरे , वाकाटकांचे वाकटे कोकाटे, सातवाहनांचे सातकर्णीचे सातपुते, गुप्तांचे गुप्ते, होयसळांचे भोसले, यादवांचे यादव जाधव,
परमारांचे पवार, क्षहारातचे खरात, कदंबाचे कदम ... असे अनेक ... राठोड चव्हाण अशी अनेक आडनावे यांची नाळ इतिहासात जोडली जाते ... त्यात कितपत तथ्य आहे ?
खरं तर बदामी किल्ला, अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील मंदिरं ही तिसर्या दिवशीची सफर. बदामीस पोहोचल्यावर पहिल्या दिवशी बदामी लेणी पाहून दुसरे दिवशी ऐहोळे आणि पट्टदकलची मंदिरे पाहून तिसरा दिवस थोडा आरामाचा जावा म्हणून त्या दिवशी फक्त बदामी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर आणि महाकूट मंदिर संकुल बघायचे ठेवले होते, मात्र ह्याच दिवशी हे सर्व बघूनही सिडलाफडी अनपेक्षितरित्या झाल्याने एक दमदार वाटचाल झाली होती. भौगोलिक सलगतेमुळे शिवाय इतरांनाही बदामी झटपट करता यावे म्हणून तिसर्या दिवशीच्या ह्या सफरीविषयी आधीच लिहितो आहे, याच्या पुढील लेखात सिडला फडी बघून आपण ऐहोळेतील मंदिरे बघायला जाऊ.
बदामी किल्ला
खरं तर बदामी किल्ला दोन वेगवेगळ्या पहाडांवर असल्याने त्याचे तसे दोन भाग पडतात, बदामी लेण्यांच्या वर असलेल्या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पुरातत्त्व खात्याने बंद केला आहे मात्र त्याच्या समोरील असलेल्या किल्ल्यावर मात्र सहजी जाता येते आणि बदामीच्या सफरीस आलेल्या प्रत्येकानेच ह्या किल्ल्याची अद्भूतरम्य सफर अवश्य करावी. होतं काय बरेचसे लोक सकाळी बदामी लेणी करुन दुपारी ऐहोळे पट्ट्दकल करुन रात्री मुक्कामी हंपीस जातात त्यामुळे बदामीतील ही ठिकाणे बघण्याची राहून जातात. असा घाईगडबडीचा दौरा त्या ठिकाणांनाही पूर्ण न्याय देत नाही तेव्हा बदामीस यायचे नियोजन करताना आपल्या हाती किमान अडीच दिवस असतील असे पाहूनच यावे. बदामी लेणी पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव पर्यटक बदामीच्या किल्ल्याला भेटच देत नाहीत त्यामुळे समोरच गर्दीने ओसंडून वाहणार्या बदामी लेणीपेक्षा इथे निरव शांतता प्रकर्षाने जाणवते.
तर बदामी किल्ल्यावर जाणे तसे अत्यंत सोपे आहे. बदामीच्या मुख्य बाजारातून अगस्ती तलावाकडे जाणारे सर्वच रस्ते इथे येऊन मिळतात मात्र इथे स्वतःची गाडी घेऊन जाऊ नये. कारण येथील अरुंद आणि दाटीवाटीच्या रस्त्यावर गाडी नेणे अत्यंत कठीण. जे पर्यटक बदामीस सार्वजनिक वाहनांनी आले आहेत त्यांनी चालत किंवा रिक्षाने बदामी किल्ल्याच्या पायथ्याशी येणे श्रेयस्कर. जे लोक खाजगी वाहनांनी आलेले आहेत त्यांनी वाहन हॉटेलवरच ठेवून रिक्षाने यावे किंवा बदामी लेण्यांच्या पार्किंगला स्वतःचे वाहन लावून किल्ल्याच्या पायथ्याशी चालत सात ते आठ मिनिटात पोहोचता येते. आम्ही हाच मार्ग निवडला. अर्थात इकडे चालत यायचे म्हणजे नाक दाबूनच यावे लागते. बाजूची वस्ती बकाल आहे, सांडपाणी, डुकरे, दुर्गंधी यांच्याशी सामना करतच येथवर पोहोचावे लागते. बदामी किल्ल्यावर जाण्यासाठी लेण्यांच्या पार्किंगमधून येण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे येल्लम्मा मंदिरावरुन अगस्तीतलावाच्या पायर्यांवरुन चालत जाऊन येथे पोहोचता येते, हा सर्वात जवळचा मार्ग, मात्र काही काही ठिकाणी ह्या पायर्या ओलांडणे थोडे जिकिरीचे आहे. तर दुसरा मार्ग यल्लम्मा देवळाच्या इथे असलेल्या वस्तीतून चालत जाऊन येथे पोहोचता येते. वाटेत ठिकठिकाणी वस्तीतील अरुंद वळणांवर 'बदामी संग्रहालय' असे फलक आहेत.
खालील छायाचित्रात दोन्ही मार्ग दिसतील. उजवीकडचा मार्ग तलावातील पायर्यांचा आहे तर मशिदीच्या बाजूस डावीकडील मार्ग हा वस्तीतून जाणारा आहे.
अगदी पाच सात मिनिटातच आपण वस्तीतून बाहेर येतो आणि एका प्रवेशद्वारातून आत जाताच बदामी किल्ल्याच्या शांत, सुंदर वातावरणात प्रवेश करतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग जरी लहान दिसत असला तरी येथून कारसारखी वाहने सहज प्रवेश करु शकतात मात्र कारने येथवर येणेच जिकिरीचे असल्याने ते टाळावेच.
प्रवेशद्वार
येथून पुढे आल्यावर दिसते ती बदामी पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयाची इमारत, त्याबद्द्ल आपण पुढे वाचूच. सकाळची वेळ असल्याने आम्ही आधी बदामी किल्ला पाहून मगच वस्तुसंग्रहालय पाहायचे ठरवले. बदामी किल्ल्यावर जाण्यास प्रवेश फी नाही.
बदामी पुराणवस्तु संग्रहालय
ह्याच्याच डाव्या बाजूस आहे ते किल्ल्यावर जाणारे पहिले प्रवेशद्वार. दोन भव्य प्रस्तरखंडांच्या बेचक्यात हे प्रवेशद्वार आहे.
मंडप
ह्या प्रवेशद्वारातून आत जाताच आपला इथल्या अद्भूत जगात प्रवेश होऊन आपण त्यात जणू हरवूनच जातो. चालुक्यांचा राजा पुलकेशी(पहिला) याने इसवी ५४३ मध्ये हा बळकट किल्ला बांधला. ह्याची तटबंदी पार अगस्ती तलावाला भिडली आहे. पर पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे जाताच प्रचंड मोठ्या प्रस्तरखंडांमधून एक प्रशस्त रस्ता पुढे जाताना दिसतो. हाच ह्या किल्ल्याचा राजमार्ग मात्र येथे डावीकडे एक लहानशी वाट एका बेचक्यात जाताना दिसते ही वाट न चुकवण्याजोगीच. ह्या वाटेतच लपला आहे किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाण्याचा मार्ग. एकमेकांना अगदी चिकटलेल्या दोन प्रचंड खडकांच्या बेचक्यातून जेमतेम एक माणूस घसटत घसटतच कसाबसा जाऊ शकेल इतकीच अरुंद असणारी पायर्यांची वाट आपल्याला किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे घेऊन जाते.
किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाणारी वाट
त्या वाटेवरुन वर आल्यावर एकदम प्रशस्त असे दोन टेहळणी मंडप दृष्टीस पडतात. येथून बदामीच्या कड्याचे, बदामी गावाचे, वरचे आणि खालच्या दोन्ही शिवालयांचे सुंदर दर्शन होते.
बेचक्यातून वर आल्यावर दिसणारे टेहळणी मंडप, उजवीकडे खालच्या बाजूस किल्ल्यावर जाणारा राजमार्ग
अगदी समोरच दिसणारे खालचे शिवालय
कड्याच्या वर असणारे वरचे शिवालय
हे सगळे निवांत पाहून बेचक्यातून खाली येऊन परत राजमार्गाला लागलो. अतिशय भव्य कड्यांच्यामधून जाणारी वाट काही पायर्या चढून डावीकडे वळते. लाल, गुलाबी, काळ्या, करड्या, निळसर इत्यादी रंगांच्या विविध छटा सकाळच्या कोवळ्या उन्हात निसर्गाचे अनोखे विभ्रम दाखवत असतात.
डावीकडे वळताच कड्याच्या दोन भागांमध्ये खुबीने बनवलेले एक अत्यंत देखणे प्रवेशद्वार नजरेस पडते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देखणे द्वारपाल कोरलेले आहेत.
प्रवेशद्वार
द्वारातून पुढे येताच दोन रस्ते फुटलेले दिसतात. डावीकडचा रस्ता खालच्या शिवालयाकडे जातो तर उजवीकडील रस्ता किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या शिवालयाकडे जातो. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी एका भग्न इमारतीचे अवशेष आहेत. हे बहुधा दारुकोठार किंवा शस्त्रागार असावे.
तिठा
खालचे शिवालय
इथून आम्ही खालच्या शिवालयाकडे गेलो. द्राविड शैलीत बांधलेल्या ह्या शिवालयाचा काल इसवी सनाच्या सहाव्या शतकातला आहे. एक छोटा प्रवेशमंडप, सभामंडप आणि प्रदक्षिणापथासह असलेले गर्भगृह अशी याची रचना, मात्र कालौघात इतर भाग पडून गेल्यामुळे आज फक्त गर्भगृह त्याच्या शिखरासहच शिल्लक राहिलेले दिसते. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर नक्षीकाम असून द्वारपाल आहेत. या मंदिराचे काही काम किंवा जीर्णोद्धार विजयनगरच्या राजवटीत देखील झाले आहे.
खालचे शिवालय
येथून समोरील पहाडात असलेल्या बदामी लेण्यांचे, बदामी गावाचे आणि अगस्ती तलावाचे मनोरम दर्शन घडते.
शिवालय बघून पुन्हा मागे आलो आणि पुढील किल्ला बघण्यास निघालो. थोडे पुढे जाताच एक वाट किंचित खालती उतरुन ध्वजस्तंभाच्या बुरुजाकडे जाताना दिसते.
बुरुजाच्या अलीकडे जमिनीतच अंतर्गत खोदलेली एक कोठी नजरेस पडते. हे बहुधा शस्त्रागार, दारुकोठार किंवा खजिन्याची खोली असावी.
ध्वजस्तंभाचा बुरुज
बुरुजावर असलेल्या जंघ्यांमधून बदामीचा परिसर आणि खालच्या बाजूस असणार्या मलिगेट्टी शिवालयाचे अप्रतिम दर्शन घडते. ह्या शिवालयास जाण्याचा मार्ग गावातून असून वेळेअभावी इकडे जाता आले नाही. द्राविड शैलीत असणारे हे आणि एका विशाल प्रस्तरावर उभारलेले हे चालुक्यकालीन शिवालय अत्यंत देखणे आहे.
मलिगेट्टी शिवालय
आलो तसाच परत मागे येऊन किल्ल्याच्या वरच्या भागाला लागलो. थोडे पुढे जाताच वाट उजवीकडे वळून खडकातच असलेल्या अजून एका प्रवेशद्वारापाशी येते.
धान्यकोठारे
प्रवेशद्वारातून आत आल्यावर या अरुंद वाटेने वर येताच आपण पोहोचतो ते इथल्या धान्यकोठारांपाशी. वाटेत खडकातच गणपती, नंदी आदी मूर्ती कोरलेल्या दृष्टीस पडतात.
धान्यकोठारे
इथली धान्यकोठारे एकदम वेगळ्या शैलीची. निमुळत्या घुमटाकार आकारात खालच्या बाजूस मोठ्या प्रस्तरखंड लावून आणि वरच्या भागात लहानलहान प्रस्तरखंड खुबीने बसवून ही निर्माण केलेली आहेत. आत जाण्यास लहानसे खिडकीवजा प्रवेशद्वार असून आतून ती पोकळ आहेत.
वरच्या भागात जाण्यासाठी प्रस्तरांच्याच खुंट्या केलेल्या आहेत. येथे बाजूलाच काही भग्न इमारतींचे अवशेष देखील आहेत.
वरचे शिवालय
धान्यकोठारे पाहून वर जाताच आपला किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश होतो व वरच्या शिवालयाचे दर्शन घडते. वाटेत एक भग्न इमारत असून आतमध्ये एक बांधून काढलेली एक खोल चौकोनी विहिर आहे. विहिरीवर एक छत देखील आहे.
भग्न इमारत आणि त्यापुढे शिखर दृश्यमान असणारे वरचे शिवालय.
येथून पुढे जातात पूर्णरुपात सामोरे येते ते शिवालय.
अगदीच कड्याच्या टोकावर असलेल्या पूर्णपणे द्राविड शैलीत असणार्या ह्या शिवालयाच्या सभामंडपाचा एका बाजूचा भाग आज अस्तित्वात आहे. मंडपातून गर्भगृहाचा प्रदक्षिणापथ आहे. प्रदक्षिणापथात उजेड येण्यासाठी चक्राकार नक्षी असणार्या सुरेख खिडक्या आहेत.
शिवालय
शिवालयाच्या सभामंडपावर हत्ती, सिंह आदींच्या प्रतिकृती असून पट्टीकांवर यक्षमूर्ती तसेच कृष्णाच्या जीवनातले काही प्रसंग कोरलेले आहे. एकूणातच वैष्णव मूर्तींचे येथे प्राबल्य असल्याने हे शिवालय मूळचे विष्णू मंदिर होते की काय अशी शंका घेण्यास येथे पूर्ण वाव आहे. सभामंडपालाही प्रदक्षिणापथ आहे. असे दुहेरी प्रदक्षिणापथ असणे ही चालुक्यकालीन शैलीची विशेषता.
सभामंडपातील मूर्ती
शिवालयाचे समोरून दर्शन
वरुन दिसणारे खालचे शिवालय
मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेला विदारण नृसिंह
गर्भगृहाच्या प्रदक्षिणापथात असणार्या चक्राकार देखण्या खिडक्या
हे शिवालय बघून परत निघालो, येथून आलो तसेच परत येऊन खाली भूतनाथ मंदिराकडे जाता येते किंवा थोडे पुढे जाऊन गुहेत असणार्या अंजनेय गुडीच्या मार्गाने खाली उतरून पलिकडच्या बाजूने वळसा मारून कप्पे आरभट्ट शिलालेखाच्या बाजूने खाली उतरुन भूतनाथ मंदिराकडे जाता येते. मात्र तो मार्ग इतका आकर्षक नाही त्यामुळे आम्ही ह्याच मार्गाने खाली उतरलो.
उतरताना पुन्हा पुन्हा अजस्त्र प्रस्तरखंडांचे दर्शन होतच होते.
पुराणवस्तु संग्रहालय
झपाझप उतरुन खालती संग्रहालयापाशी आलो. माणशी तिकीट पाच रूपये आहे. फोटो काढण्यास मात्र मनाई आहे. संग्रहालयात फारसे कुणी जात नाहीत मात्र हे न चुकवण्याजोगे आहे. आतमध्ये कृष्णलीला असणारी तोरणे, एका मंदिराचे दोन्ही बाजूस मूर्तीकाम असलेले एक अजस्त्र तोरण असून कित्येक चालुक्यकालीन भग्न मूर्तींचे अवशेष आहेत. मात्र येथील आवर्जून पाहण्यासारखे म्हणजे एक प्रचंड लज्जागौरी. मस्तकाच्या जागी कमल असलेली एक कुठेही भग्न न झालेली ही लज्जागौरी पाहणे म्हणजे एक अर्वणनीय अनुभव. अशीच एक लज्जागौरी महाकूट मंदिराच्या आवारात देखील आहे मात्र ती अर्धी भग्न झालेली आहे त्याबद्द्ल पुढच्या भागात येईलच. संग्रहालयाच्या आवारात देखील कित्येक मूर्ती ठेवलेल्या आहेत.
संग्रहालयची इमारत आणि किल्ल्याचे टेहळणी मंडप
खरे तर ह्याच भागात मल्लिकार्जुन, भूतनाथ मंदिरे आणि विष्णू गुडी बद्द्ल लिहायचे होते पण विस्तारभयास्तव त्याबद्द्ल पुढील भागात लिहिन.
क्रमशः
बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
उपप्रश्न: प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.
रच्याकने बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
हो, इकडे लाल गुलाबी, बदामी रंगाच्या वालुकाश्माचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे बदामी हे नाव, मात्र मूळचे नाव वातापि.
प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
नाही, दोन्हीकडे शैव वैष्णव दोन्ही पंथ कमीजास्त प्रमाणात सारखेच पसरलेले होते. वैष्णव चालुक्य आणि विजयनगरच्या राजांनी शैव मंदिरेही मोठ्या प्रमाणावर उभारलेली आढळून येतात.पट्टदकल आणि ऐहोळेची बहुतांशी मंदिरे ही शैवच आहेत.
ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.
बदामीचे अजून एखाद दोन भाग झाल्यावर ऐहोळे सुरू करेन त्यानंतर पट्टदकल.
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी किल्ला उतरुन संग्रहालय पाहिले, हे संग्रहालय अगदी न चुकवण्याजोगेच आहे. ते पाहून आता अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिर पाहायला निघालो. आपल्या डाव्या बाजूला बदामी किल्ला आणि उजव्या बाजूस अगस्ती तलाव, आणि त्याच्या पलीकडे बदामीच्या लेण्या असे सुरेख दृश्य येथून बघायला मिळते. संग्रहालयाच्या पुढेच एक भग्न मंदिर आहे आणि त्याच्या पुढून एक वाट डावीकडे वळते. त्या वाटेने सरळ गेल्यास थोडक्या अंतरावर कड्यात एक शिलालेख आहे तो म्हणजे कप्पे अरभट्टाचा लेख.
कप्पे अरभट्ट शिलालेख
बदामी किल्लयावरुन अंजनेय गुहामंदिरावरुन किल्ल्याला वळसा घालूनही हा शिलालेख पाहता येतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे भूतनाथ मंदिराकडे जाताना डावीकडे वळूनही हा शिलालेख बघता येतो. ही जी डावीकडची वाट दिसते ती बदामीच्या डोंगरातून थेट जाते महाकूट मंदिर समूहाला. येथून महाकूट समूह आहे जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर मात्र ही फक्त पायवाट आहे. भरपूर वेळ असल्यास येथून चालत जाऊन महाकूट मंदिर समूह बघता येतो, अन्यथा गाडीवाटेने दहा/बारा किमी फिरुन महाकूटला जाता येते. महाकूट आपण नंतर बघणार आहोतच त्यामुळे त्याविषयी अधिक आता लिहित नाही. तर ह्या डाव्या वाटेने वळलो, उजवीकडे एक वस्ती आहे आणि डावीकडे बदामीचा कडा, येथून साधारण दिडशे मीटर अंतरावर कड्यात आहे इसवी सन ७०० मधील कप्पे अरभट्ट शिलालेख. कप्पे अरभट्ट हा एक योद्धा आणि कवी. हा शिलालेख आहे एक कन्नड काव्य. दहा ओळीत असलेल्या ह्या कन्नड लेखात ५ कडवी आहेत पैकी तिसरी आणि चौथी ओळ मिळून एक संस्कृत श्लोक आहे तर इतर ही कन्न्डमध्ये आहेत. पहिली ओळ सोडली तर इतर सर्व त्रिपदीत आहेत. हा लेख म्हणजे प्राचीन कन्नड काव्याचा एक नमुनाच. काही जण ह्याला पहिले कन्नड काव्य असेही मानतात. शिलालेखाच्या शेवटी एक चक्र आणि त्याच्या मध्ये आणि खालच्या बाजूस नक्षीकामही केलेले आढळते.
कप्पे अरभट्ट शिलालेख (जिथे कुंपण संपतं तिथेच वरील बाजूस आहे)
कप्पे अरभट्ट लेख पाहून परत मागे येऊन अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिराकडे निघालो. वाटेतच एक सुंदर मंदिरसमूह आहे तो म्हणजे मल्लिकार्जुन समूह.
मल्लिकार्जुन मंदिर
बदामी, ऐहोळे, पट्टदकल मधील मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे येथील मंदिरे सहसा समूह रूपात दृष्टीस पडतात, म्हणजे एक मुख्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूने लहान लहान अशी काही मंदिरे, रूढार्थाने ह्याला पंचायतन असेही म्हणता येत नाही कारण मंदिरांची संख्या कमीअधिक आढळते तसेच ही बरेचदा ही उपमंदिरे इतर देवतांसाठी नसून त्यात शिवपिंडीच आढळतात. मल्लिकार्जुन मंदिरही हे असेच. तारकाकृती तळखड्यावर इसवीसनाच्या ११ व्या शतकात हे मंदिर बांधले ते उत्तर चालुक्यांनी (कल्याणीचे चालुक्य). एकावर एक थर असलेली मंदिरबांधणीची फांसना शैली हे उत्तर चालुक्यांचे वैशिष्ट्य. हे मंदिर याच शैलीत आहे.
उतरत्या छपरांचा मुखमंडप, त्यापुढे आयताकार बंदिस्त सभामंडप आणि त्यापुढे गर्भगृह आणि त्यावर फांसना पद्धतीचे शिखर अशी याची रचना. ह्या मंदिरात मूर्तीकाम नाही मात्र फांसना पद्धती समजण्यासाठी हे मंदिर आवर्जुन बघावे असेच.
मल्लिकार्जुन मंदिर मुखमंडप
मुखमंडप, सभामंडप आणि फांसना शिखर रचना
स्तंभयुक्त सभामंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग
उपमंदिरे
मल्लिकार्जुन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो ते येथील एका सुंदर मंदिराकडे अर्थात भूतनाथ मंदिराकडे
भूतनाथ मंदिर
हे बदामीतील सर्वांगसुंदर मंदिर. अगस्ती तलावाच्या ऐन काठावर वसलेले हे मंदिर पुढ्यातील विशाल तलावामुळे अधिकच खुलून दिसते. मंदिराच्या मागेच असलेला बदामीचा लालगुलाबी पहाड अगदी उठून दिसतो. भूतनाथ मंदिर देखील येथील इतर मंदिरांप्रमाणेच एकूटवाणे नसून एका समूहाच्या स्वरुपात आहे. मुख्य मंदिराची रचना काहीशी संमिश्र आहे. अंतराळ आणि गर्भगृहाचे शिखर हे द्राविड शैलीत असून ते बदामीच्या चालुक्यांनी बांधलेले आहे, तर उतरत्या छपरांचा सभामंडप हा कल्याणी चालुक्यांनी वाढवला. सभामंडप हा विविध स्तंभांवर तोललेला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शैव द्वारपालांची अपूर्ण राहिलेली शिल्पे आहेत तर त्यांच्या खालील बाजूस मकरवाहिनी गंगा आणि कूर्मवाहिनी यमुना अशी सरिताशिल्पे आहेत. तलावाच्या अगदी काठावर असूनही पुढ्यातील अगस्ती तलाव संपूर्ण भरला तरीही भूतनाथ मंदिरात पाणी शिरत नाही याचे कारण म्हणजे तलावाचा लेणीकडील बाजूस अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी एक वाट निर्माण केली आहे. मुख्य मंदिराची भोवती काही उपमंदिरे असून एकात लकुलिश शिवाची एक मूर्ती आहे.
भूतनाथ मंदिर
भूतनाथ मंदिर
गर्भगृहाच्या बाहेर नंदी असून आतमध्ये शिवलिंग आहे.
द्राविड पद्धतीचे शिखर असलेले भूतनाथ मंदिर व त्याच्या बाजूस असलेली उपमंदिरे
भूतनाथ मंदिर समूहाच्या मागेच असलेल्या एका विशाल प्रस्तरावर आहे विष्णूगुडी अर्थात विष्णूचे मंदिर.
विष्णूगुडी
मागच्याच प्रचंड खडकावर फांसना शैलीतले एक लहानसे मंदिर आहे, हौशी लोक त्या खडकावर जाऊन तलावात उड्या मारत असल्याने तेथे जायची वाट पुरातत्त्व खात्याने बंद केली आहे तरी हे लहानसे मंदिर विलक्षण सुंदर दिसते.
खडकावरील लहानसे मंदिर
ह्या प्रस्तराजवळ गेलो असता खडकातच उंचावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. जणू मूर्ती कशी खोदावी ह्याचा सराव करण्यासाठीच ह्या कोरण्यात आल्या असाव्यात. ह्या मूर्तींमधे आहेत वराह, गणेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, महिषासुरमर्दिनी आणि हिरण्यकश्यपूचे विदारण करणारा उग्र नृसिंह.
उग्रनृसिंहाच्या बाजूलाच द्राविड पद्धतीचे एक मंदिर कोरलेले दिसते.
ब्रह्मा, विष्णू, महेश
डाव्या बाजूस प्रस्तरावर जाणारी वाट आहे जी सध्या बंद केलेली आहे.
हे बघून परत मागे न फिरता प्रस्तराला उजव्या बाजूने वळसा घालून थोडक्या पायर्या उतरल्यावर दिसते एक अनंतशयनी विष्णूचे मंदिर अर्थात विष्णूगुडी. अर्धे बांधीव आणि अर्धे खडकात कोरलेले शिखरविहिन असे हे मंदिर अगदी न चुकवण्याजोगेच. ह्या मंदिरात अनेक आश्रर्ये दडून बसलेली आहेत.
अनंतशयनी विष्णू मंदिर
मंदिरात समोरच अनंतशयनी अर्थात शेषावर शयन करणारी मूर्ती आहे मात्र ती बघण्याआधी आपण ह्या मूर्तीच्या डाव्या बाजूस असलेली त्रिमूर्ती मूर्ती बघू. ही त्रिमूर्ती विराजमान झाली आहे ती द्राविड पद्धतीने कोरलेल्या मंदिरात. विष्णू, शिव आणि ब्रह्मा अशा ह्या मूर्तींचा क्रम. विष्णूच्या खाली गरुड पूर्णपणे कोरला आहे तर शिवाच्या आणि ब्रह्माच्या मूर्तीखाली अनुक्रमे नंदी आणि हंसाची फक्त बाह्यरेषा कोरलेली आहे. हे काम अर्धवटच राहिलेले दिसते.
त्रिमूर्ती
ह्या मूर्तीच्या समोर आणि अनंतशयनी विष्णूच्या उजव्या बाजूस आहेत नमन करणारे साधक आणि त्यांच्या बाजूस एक गाय आणि तिचे दुग्धप्राशन करणारे वासरु.
आता मुख्य अनंतशयनी विष्णूची मूर्ती पाहूयात.
प्रथमदर्शनी येथील मूर्ती ओबडथोबड दिसेल आणि संगमरवरात कोरल्यासारखी वाटेल पण ती तशी नसून आतल्या खडकात ती कोरलेली असल्याने खडकांमधील रेषा मूर्तीवरही आलेल्या दिसतात.
शेषावर पहुडलेला विष्णू अतिशय देखणा असून विष्णूच्या उशापाशी एक सेवक आहे तर लक्ष्मी त्याचे पाय चुरत आहे. लक्ष्मीच्या शेजारी गरुड नमस्कारमुद्रेत उभा आहे. विष्णूच्या नाभीतून कमळ उमललेले आहे. कमळाचा देठ हा विष्णूच्या हातामागून मोठ्या खुबीने कोरलेला आहे. विष्णू हा आराम करत असल्याने शंख, चक्र, गदा ही त्याच्या बाजूस ठेवलेली असून त्याने फक्त पद्म धारण केले आहे. विष्णूच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.
अनंतशयनी विष्णू
मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, त्याच्या बाजूला नाभीकमलाच्या वरील बाजूस असलेला ब्रह्मा त्याच्या शेजारी परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि सर्वात शेवटी घोड्यावर आरुढ कल्की देखील आहे.
दशावतार
बदामीस आलात तर हे मंदिर अजिबात चुकवू नये असेच.
इथे यावे आणि तलावाच्या पाण्यात पाय सोडून तासनतास बसावे.
साधारण दिड दोन वाजत आले होते आणि प्रचंड भूकही लागली होती म्हणून आम्ही येथून बदामी गावात जेवायलो गेलो आणि आता पुढचे पडाव होता तो सिदलाफडीत, तिथली प्रागैतिहासिक गुहाचित्रे पाहण्यासाठी.
सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
खरं तर सिदलाफडीच्या प्रागैतिहासिक गुहेबद्द्ल, तिथल्या चित्रांबद्द्ल माहिती असूनही तिथे जाणे आमच्या मूळच्या योजनेत नव्हतं. एकतर वेळेच्या नियोजनात ते नीट बसत नव्हतं. शिवाय त्यासाठी भरपूर तंगडतोड आवश्यक होती. आणि कालच्या ऐहोळे-पट्टदकलला (ह्याबद्द्ल पुढे लिहिणार आहेच) सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चालणं झालं होतं त्यामुळे आजच्या दिवशी बदामी किल्ला, भूतनाथ मंदिर समूह आणि दुपारनंतर महाकूट आणि बनशंकरी पाहायचे असे ठरवले होते. मात्र ऐहोळे आणि बदामीच्या दोन्ही संग्रहालयात सिडलाफडीची छायाचित्रे पाहून तिथे जायची उर्मी जागृत झाली आणि आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून जेवल्यानंतर लगेचच महाकूट आणि सिदलाफडीला जाण्याचे ठरवले. आधी सिदलाफडी की आधी महाकूट असे ठरवताना महाकूटला संध्याकाळ झाली तरी चालण्यासारखे होते मात्र सिदलाफडीचा रस्ता अगदी निर्जन असल्याने ते आधी करण्याचे ठरवले आणि सिदलाफडीला निघालो. बदामीपासून बदामी रेल्वे स्टेशन्/ऐहोळे जाण्याच्या वळणाआधीच हॉटेल पॅराडाइझच्या बाजूलाच सिदलाफडीला जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला एक उद्यान आणि एक कमान आहे. ह्या कमानीतूनच पुढे सिदलाफडीला पोहोचता येते. मात्र हा रस्ता पूर्ण चढणीचा आणि कच्चा आहे. येथून फक्त ट्रॅक्टरसारखीच वाहने जाऊ शकतात. कार अजिबात जाऊ शकत नाही. कमानीजवळच असलेल्या उद्यानापाशी गाडी लावली आणि पुढे निघालो.
सिदलाफडीला जाणारा हा रस्ता जवळपास चार किलोमीटर अंतराचा आहे. जवळपास निम्मा टप्पा चढणीचा आहे आणि उरलेला निम्मा सपाटीचा आहे. खुरट्या झुडपांतून जाणार्या ह्या रस्त्यावर कुठेही सावली नाही, त्यामुळे उन्हाळ्यात भरदुपारी येथे येताना भरपूर पाणी आणि इथल्या तीव्र उन्हातून चालण्याची मानसिक तयारी आवश्यक. इथून जाताना सुरुवातीचा चढ चढून गेल्यावर एक रेडियो/टीव्ही टॉवर लांबवर आपल्या डाव्या हातास दिसतो. रस्ता चांगलाच रूंद आणि मळलेला आहे. आपण सरळ ह्या टॉवरच्या दिशेने चालू पडायचे. सुरुवातीच्या चढाईने छातीचे झालेले भाते आता एका लयीत आलेले असतात आणि आपण वेगाने टॉवरपाशी आलेलो असतो. आपण बदामीच्या डोंगराच्या माथ्यावर आलेलो असतो आणि आता आपली पुढची चाल समपातळीवरुन होणारी असते.
सिदलाफडीला जाणारा रस्ता
इथपर्यंत तीव्र चढण आहे. एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला ह्या टॉवरपाशी जायचे आहे, आणि ठळक रस्ता आपल्याला तिथेच घेऊन जातो.
चुकण्याचा संभव ह्या टॉवरपाशीच आहे. सरळ जाणारा रूंद रस्ता पुढे खालच्या बाजूस असलेल्या एका लहानशा वस्तीपाशी जातो. आणि डाव्या बाजूस वळलेली एक वाट शंभरएक मीटरवर खडकाळ मार्गामुळे हरवून गेलेली दिसते. मात्र टॉवरपाशीच आपण पोहोचायचे हे अवश्य लक्षात असू द्यावे.
टॉवरपाशी परत आपल्याला एक रूंद वाट लागते जी पोहोचवते सिदला फडीला. वाटेत निसर्गाची अनेक भूरुपे दिसू लागतात. माथ्यावरच्या वार्यांमुळे, पावसामुळे येथील वालुकाश्मांचे विदारण होऊन अनेक लहान लहान टेकड्यांसदृश खडक येथे दिसू लागतात.
टॉवरच्या पुढची पायवाट
विविध प्रकारची भूरुपे
टॉवर आता मागे पडला होता
सिदला फडीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे निर्जन आहे. मात्र येथे जनावरांची तशी भिती नाही, मात्र वाटेत आम्हाला केसांचा समावेश असलेल्या वन्यप्राण्यांच्या काही विष्ठा दिसल्या त्यावरुन येथे बिबट्या, तरस, अगदीच कुणी नसले तरी खोकड, कोल्हे असावेत असे वाटते. अजूनही मात्र गुहेचे दर्शन होत नसल्याने पुढे जाताना आपण चुकल्याचे जाणवत राहते पण प्रत्यक्षात तसे नाही. खाली रस्त्यानजीक गाडी लावल्यापासून सुमारे चार किमीची दमदार वाटचाल करुन आपण सिदलाफडी नजीक पोहोचलेलो असतो. अचानक एका वळणापुढून समोर एक कातळ दृगोच्चर होतो, तिच ही सिदलाफडी.
सिदलाफडीचे प्रथम दर्शन
थोडे पुढे जाताच सिदलाफडीची नैसर्गिक कमान दृष्टीपथास येते.
येथून कमानीत जाताना किंचीत खालच्या पातळीवर उतरावे लागते आणि आता सिदलाफडी तिच्या पूर्ण रुपासह आपल्याला सामोरी आलेली असते.
सिदलाफडीचा शब्दशः अर्थ म्हणजे विजेचा खडक. अर्थात येथील कमानीवर वीज पडून येथील छिद्रे तयार झाली आहेत अशी समजूत. दुरुन लहान दिसणारी ही नैसर्गिक कमान प्रत्यक्षात मात्र बरीच रूंद आहे आणि जवळपास तीन पुरुष उंचीची आहे. कमानीत वरच्या बाजूस छिद्रे असल्याने आतमध्ये पुरेसा प्रकाश आहे. आदिमानवांना ही निवार्यासाठी ही आदर्श जागा वाटल्यास त्यात काहीच नवल नाही. खालच्या पातळीवर असल्याने ऊन वार्यांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते. आपल्या फावल्या वेळात आदिमनावांनी करमणूक म्हणून येथे सफेद रंगात चित्रे रंगवलेली आहेत. आजमितीस ह्या चित्रांचे स्वरुप बरेचसे अस्पष्ट आहे. येथील वालुकाश्म हा ठिसूळ असल्याने आतील भिंतीची झिरपणार्या पाण्याने बरीच हानी झालेली आहे त्यामुळे ह्या चित्रांबद्द्ल तर्कच लढवावे लागतात. संशोधकांनी ह्या चित्रांचा कालावधी कमीतकमी ३००० वर्षे जुना असा मानला आहे. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर काही स्पष्ट तर काही अस्पष्ट अशी चित्रे नजरेस पडतात.
सिदलाफडीचा नैसर्गिक निवारा आतील बाजूने
गुहेच्या वरच्या भागातील छिद्रे जी वीजेमुळे पडली आहेत असे मानले जाते.
आता काही चित्रे पाहूयात.
हे एका लहान मुलीचे चित्र दिसते
इथले सर्वात सुस्पष्ट आणि चटकन ओळखू येणारे असे चित्र म्हणजे बैलाचे
हे पक्ष्याचे चित्र दिसतेय. त्याची चोच, मस्तक, शरीर, पाय नीट दिसतात. बाजूला त्याची पिल्ले किंवा इतर काहीतरी पायांसारखी चित्रे आहेत
हा बहुधा विंचू किंवा चार पायांवर चालणारा कुणीतरी प्राणी
हे चित्र नीटसे ओळखू येत नाही, कुणीतरी प्राणी असावा. ही चित्रे खूपच अस्पष्ट असल्याने आपल्याला येथे ती ओळखण्यासाठी आपल्या कल्पनांना पूर्ण वाव आहे.
हे बहुधा शिकार्याचे चित्र असावे
येथे अजूनही काही चित्रे दिसत राहतात, त्यात हल्लीच्या नवकलाकारांची कलाकारीही दिसते. प्राचीन वास्तूंची हानी होण्याचा शाप ह्या स्थळालाही मिळाला आहेच.
खरे तर येथील चित्रे सरकारने संरक्षित करणे आवश्यक आहे अन्यथा मनुष्यांच्या वावराने येथील चित्रांचा लवकरच नाश होईल. सिदलाफडीबाबत मात्र एक सांगणे अगत्याचे वाटते ते असे की येथे भीमबेटकासारखी अद्भुतरम्य चित्रे, अत्यंत सुस्पष्ट चित्रे असतील, संख्येने भरपूर चित्रे असतील अशी कल्पना करुन अजिबात येऊ नये. येथील चित्रे अगदी साधी, चुन्याने रंगवलेली अशी पांढर्या रंगाचीच आहे. मात्र येथे येणारी सुरेख वाट, सुरेख कमान आणि आपण हंटर - गॅदरर्सच्या जगातील प्रागैतिहास असं काही अद्भूतरम्य पाहतो आहोत जे आपण पूर्वी कधीही पाहिलेले, अनुभवलेले नाही असे वाटणार्यांनी येथे हमखास आणि अवश्य यावे. बदामीस येऊन हे ठिकाण न चुकवण्याजोगेच.
आता जवळपास चार वाजत आलेले होते. पुढचे महाकूट करायचे असल्याने आम्ही येथून निघालो. टॉवर पार करुन आता पुढे उतार असल्याने झपझप चालत गाडीपाशी आलो आणि तेथून महाकूटला निघालो. मात्र महाकूटवर लिहिण्याआधी आदल्या दिवशी केलेल्या ऐहोळे आणि पट्टदकलचा वृत्तांत अजून लिहायचा असल्याने आधी ऐहोळे आणि पट्टदकलविषयी लिहून नंतरच महाकूटवर लिहिन.
आता पुढच्या भागात ऐहोळे.
क्रमशः
शिल्पट समजण्यासाठी पौराणीक कथा माहीत असायला हव्यात. एकाच ठिकाणी वेगवेगळे देव आणि वाहनं आहेत.
तो शिलालेख मुख्य गुहांपासून दूर का लिहिला यांचे कारण त्यांच्या कालखंडात आणि करवणाऱ्या व्यक्तींचे राजकारणातले स्थान वेगळे असणार. राजा,मंत्री,सेनापती,नगरातील महाजन ,श्रेष्ठी वगैरे.
अनंतशयनाच्या बाजूलाच अगस्ती गुहा आहे ती पाहायला विसरलात. पण इकडे पाट्या लावलेल्या नाहीत आणि सांगायला,विचारायला कुणी दिसत नाही. तिथे राखलेल्या बागेसारख्या आवारातून तर्क केला की इथे काही असावे. आणि पुढे गेल्यावर एक दोनफुटी उंच फाटक खडकाखाली दिसले. त्यास कुलुप नव्हते. मग ते उघडून वाकून घसरत आत गेल्यावर गुहा सापडली. पंधरा फुटी उंच आहे आणि शिल्पं आहेत. इथे जर का पर्यटक आणि शालेय सहली आल्या तर झुंबड उडेल. म्हणून मुख्य बदामी गुहा दाखवणारे गाईड इकडे "काही नाही" सांगतात. हा भाग वर्ज्य आहे. आपण जाऊ शकतो.
सिदलाफडी खरंच आवडलं. जायला हवं.
तो शिलालेख मुख्य गुहांपासून दूर का लिहिला यांचे कारण त्यांच्या कालखंडात आणि करवणाऱ्या व्यक्तींचे राजकारणातले स्थान वेगळे असणार.
बदामीत असंख्य शिलालेख आहेत जिकडे पाहावे तिकडे कन्नड लिपीतले लेख दिसतातच. अगदी किल्ल्याच्या वाटेवरील कातळ भिंतीत देखील बरेच लेख दिसतात. पुलकेशीचा एक शिलालेख तर कड्यात सुमारे १३५ फूट उंचीवर आहे. तो पाहायचा म्हणलं तर रोप क्लाईंब करुन किंवा रॅपलिंगनेच पाहाता येतो.
शिलालेखात अश्या "अर्थाचे" कोरलेले आहे का ?
कप्पे अरभट्ट हा, पब्लिकच्यासाठी मायबापाहून कृपाळु, दयाळु आहे,
परंतु शत्रुच्यासाठी अतिक्रूर आहे ... (हूँ यारों का मैं यार, दुश्मनों का दुश्मन)... (जो नडला त्याला फोडला .. )
ह्या कलियुगात एक माधव (विष्णु) चा अपवाद वगळता, कप्पे अरभट्ट जैसा कोई हार्डइच नै है ...
फोटो नेहमी द्विमितीय असल्याने त्यांमधून मूळच्याआकारमानाची कल्पना येत नाही हे खरेच.
पण सिदलाफडीच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी एक छायाचित्र इथे देतो.
रस्ता चुकण्याची शक्यता अधीक दिसते
नाही, रस्ता चुकण्याची शक्यता इथे जवळपास शून्य आहे. टॉवरच्या इथेच वळायचे हे लक्षात ठेवायचे तुम्ही थेट सिदलाफडीपाशीच पोहोचता मग.
कप्पे अरभट्ट लेखाच्या खाली जे वर्तुळाकृती कोरिवकाम आहे ती राजमुद्रा टाईप काही आहे का?
ती राजमुद्रा नाही, चालुक्यांच्या राजमुद्रेत, सूर्य, शंख, चक्र आणि वराह सामावलेले आहेत. कप्पे अरभट्ट लेखात फक्त नक्षीदार चक्र आहे.
http://www.misalpav.com/node/50596
बदामी -
कंजूस काकांचा मिसळ पाव वरचा लकुंडी चा धाव वाचून तिकडे/जायच नक्की केल. गदग लकुंडी - विजापूर . एका मित्राला विचारला कि येणार का? तो म्हणाला कि लकुंडी पेक्षा बदामी करू . मी आधीच मागच्या वर्षी बदामी ला जाऊन आलो होतो पण त्याच्यासाठी म्हणून मग लकुंडी च्या ऐवजी बदामी करू असा ठरवलं तो तिकडचाच असल्यामुळे भाषेची अडचण पण येणार नव्हती. पुणे ते गदग रोज रात्री एक वाजता ट्रेन असते शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन ला जाऊन तिकीट काढले. रेल्वे मध्ये काहीच गर्दी नव्हती त्यामुळे जाताना आरामशीर जागा मिळाली आणि सकाळी ६ पर्यंत झोप पण झाली तोवर ट्रेन ने महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये प्रवेश केला होता. अलमट्टी धरणाचा परिसर हिरवीगार शेती आणि मधेच सूर्यफुलाची शेती असं दृश्य बघत आमचा प्रवास सुरु होता. साधारण ८ वाजता आम्ही विजयपूरा मध्ये होतो तेव्हा आमच्या डोक्यात विचार आला कि आज इथेच उतरून आधी विजयपुरा बघून घेऊ आणि मग रात्री बदामी ला जाऊयात. पण दुसरा दिवस जवळपास प्रवासातच वाया गेला असता म्हणून थोडा उशीर झाला तरी बदामी मध्ये जाऊन बदामी बगुन घेऊ आणि मग त्याच रात्री विजयपुरा ला येउयात असा ठरवलं. साधारण १२ वाजता बदामी ला पोहोचलॊ. बदामी हे एकदम छोटा रेल्वे स्थानक आहे. तिथे गेल्या गेल्या काळ्या तोंडाच्या माकडांनी आमचा स्वागत केला. त्याचा फोटो काढायला गेलो हे त्याने बघितला तर ते एकदम चवताळून अंगावर यायला लागला मी शांतपणे मोबाइल खाली घेतला आणि पुढे निघून गेलो तस ते शांत झाल. बाहेर पडल्या पडल्या नेहमीप्रमाणे रिक्षा वाल्यानी गराडा घातला तिथेच एक रिक्षा ७०० रुपयांमध्ये दिवसभर च्या प्रवासासाठी ठरवून घेतली त्यात तो आम्हाला बदामी शाकंभरी मंदिर अजून एक शिव मंदिर आणि पट्टडकल आणि ऐहोले आणि परत बदामी असा सोडणार होता. तिथे गेल्या गेल्या नाश्ता केला पुरी भाजी , इडली, पुलाव आणि चहा. खाऊन झाल्यावर रिक्षा ने आम्हाला बदामी गुहांच्या तिकीट खिडकीजवळ सोडल. २५ रुपये प्रति व्यक्ती अस तिकीट घेऊन आम्ही बदामी गुहा, बदामी तलाव , बदामी किल्ला असा पाहून खाली आलो. म्युझीयम बघायचा होत पण उंच पायऱ्या चढून मित्राचा गुडघा दुखायला लागला होता. म्हणून मग शाकंभरी मंदिर आणि शिव मंदिर पाहून पट्टडकल कडे गेलो
नटराज शिव, शिव-पार्वती मूर्ती छान आहेत. त्रिविक्रम मूर्ती, अर्ध्य देणारा बळी राजा, बाजूला अडवणारा शुक्राचार्य आणि भग्न वामन त्याच्या छत्रीसह उठून दिसतोय. नमुची त्रिविक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करतोय.
बदामी गुहा , तलाव आणि भूतनाथ मंदिर बघून आम्ही डोंगर चढायला चालू केला. पावसाची अजिबात चिन्हे नव्हती आणि गरम तर एवढा होत होता कि जस काही उन्हाळाच आहे आणि पाण्याची बाटली पण गाडीतच राहिली आणि जवळपास कुठेही पाणी नव्हता मग तसच जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आधी डोंगरावर जाऊन येऊ मग म्युझीयम बघूयात असा ठरवून आम्ही चालायला सुरुवात केली. डोंगरावर दोन शिवालय आहेत एक छोट आहे येथे एक तोफ ठेवलेली आहे. आणि दुसरा बऱ्यापैकी मोठ आहे वरून बदामी शहर, गुहा आणि तलाव यांचा मनमोहक दृश्य दिसत. हे सगळं बघायला १ - २ तास पुरतात. वर काही ४ - ५ टारगट मुले आम्हाला त्रास द्यायच्या उद्देशाने आमच्या जवळ आले पण मित्र त्यांच्याशी कन्नड भाषेत बोलायला लागल्यावर मग निघून गेले. वर लोकच नव्हती मोजून ८ -१० लोक असतील पण याचा फायदा आम्हाला शांतपणे फोटो काढण्यासाठी झाला. गुहा आणि म्युझीयम बघून लोक जात होते बहुतेक. वर जाईतोवरच मित्राचे गुडघे दुखायला लागले होते सगळ्यात शेवटच शिवालय न बघताच जाऊ असा म्हणत होता पण आता थोडच राहिलाय असा सांगून त्याला वर नेल. खाली येताना मात्र त्याने आधीच रिक्षा वाल्याला फोन केला आणि घ्यायला यायला सांगितलं मग आम्ही म्युझीयम न बघताच शाकंभरी मंदिराकडे गेलो
कर्नाटक दौरा भाग १ - (महाकूट मंदिर, पट्टडकल, ऐहोले)
दिनांक :- २०.१०.२०१९
महाकूट मंदिर : -
बदामी च्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशातील "महाकूट मंदिर" हे प्रमुख देवालय आहे. महाकूट हे बदामी जवळील एक छोटंसं आणि शांत असं एक गाव आहे दोन डोंगरांमध्ये असलेलं हे मंदिर शैव आणि शाक्त ह्यांचं धार्मिक स्थळ आहे महाकूट वासियांसाठी हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार अगस्थी मुनींशी झालेल्या युद्धात सहोदर वातापी आणि इल्वल ह्या दोन राक्षसांचा वाढ ह्याच ठिकणी झाला होता.
महाकुटेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे मंदिरात अर्धमंडप मुखमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आजही नित्यनियमाने तिथे पूजा होत असते
सुमारे दोन तास पट्टडकल मध्ये घालवल्यानंतर गाडी ऐहोलेच्या दिशेने वळवली तीनच्या सुमारास ऐहोले मध्ये पोहोचलो पट्टडकल जसं तसंच ऐहोले होतं. तिथेही बरीच मंदिर, एक विहीर अश्या पुरातन वास्तू. तिथे गेल्यावर सर्वात पाहिले पोहोचलो ते तेथील प्रसिद्ध दुर्ग मंदिरात. दुर्ग मंदिर हे प्रसिद्ध आहे ते त्यावरील शिल्पांसाठी. बराच वेळ असल्याकारणाने दुर्ग मंदिर मनसोक्त न्याहाळण्यास सुरुवात केली.
दुर्ग मंदिर :-
खरं पाहिलं तर हे दुर्ग मंदिर नसून हे शिव मंदिर आहे पण डोंगराच्या जवळपास असल्याकारणाने त्यास दुर्ग मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराचा आकार बघितला तर तो तो हत्ती च्या पाठीसारखा आहे . मंदिराच्या आत एक गर्भगृह आणि सभामंडप आहे मंदिराच्या खांबावर देवी देवतांची शिल्पे कोरली आहेत मंदिराच्या चहूबाजूस शंकर विष्णू महिषासुर मर्दिनी ची रेखीव शिल्पे आहेत.
सुमारे २ तास ऐहोलेमध्ये घालवून पुन्हा बदामीच्या दिशेने रवाना झालो खरंतर बदामीला जाऊन सूर्यास्त पाहायचा विचार होता पण ढगाळ वातावरणामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही पण असो महाकूट मंदिर, पट्टडकल आणि ऐहोले हे सर्व एका दिवसात पहायला मिळणं हे हि नसे थोडके. एकंदरीत काय तर रिक्षा करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता.
शेवटी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि थेट आठ वाजता बदामी मध्ये जेवायला बाहेर पडलो तिथे सुद्धा एक घरगुती खानावळ शोधून काढली आणि पोटभर जेवलो. जास्त वेळ न काढता जेऊन थेट हॉटेल मध्ये जाऊन झोपलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बदामी ला भेट द्यायची होती. दिवसभराची दगदग आणि कमी झोप ह्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.
दिवस भाराचा खर्च:
रिक्षा (दिवसभर ) : - ८००/-
नाश्ता : - ४०/-
पार्किंग : - २०/-
दही : - १०/-
पट्टदकल प्रवेश फी : - ४०/-
नारळपाणी - ३०/-
पाणीपुरी: - १०/-
जेवण :- ५०/-
ऐहोळे प्रवेश फी : - ४०/-
-----------------------------
एकूण :- १०४०/-
पुढील प्रवास पुढच्या भागात.....
टीप : -
१) बदामी ला जात असाल तर हॉटेल बुक करताना हॉटेल राजसंगम हे बस स्टॅन्ड च्या जवळ असलेले एकमेव चांगलं हॉटेल आहे.
२) पट्टडकल आणि ऐहोले एका दिवसात करायचं असेल तर रिक्षा किंवा स्वतःची गाडी सोबत असणं गरजेचं आहे रिक्षा ८०० रु घेते.
बदामी
आजच्या दिवशी भेट देण्याची ठिकाणं होती ती म्हणजे अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, बदामी लेणी आणि बदामी किल्ला. बदामी लेणीची प्रवेशाची वेळ साडेनऊची असल्या कारणाने सर्वप्रथम अगस्त्य तलावला भेट द्यायला निघालो. अगस्त्य तलाव म्हणजे बदामी किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी जिथे जमा होतं ती जागा. तलावाच्या काठावरच एक देऊळ आहे त्याचं नाव "भूतनाथ मंदिर".
सकाळी गावातील बरीच जण Morning walk साठी म्हणून अगस्त्य तलावापाशी जमले होते. मी सुद्धा सकाळी सात वाजता पोहोचलो होतो. भूतनाथ मंदिर उघडण्याची वेळ माहिती नसल्याने मी जवळचं असलेल्या पायरीवर एक काका बसले होते त्यांना विचारलं की भूतनाथ मंदिर किती वाजता उघडतं तेव्हा ते हातवारे करून मला सांगायला लागले तेव्हा मला कळलं की ते मूकबधिर आहेत. पण तरीही त्यांनी मला त्यांच्या भाषेत बदामीच्या संपूर्ण भागाची ओळख करून दिली त्यावेळी खऱ्या अर्थाने सांगायचं तर माझं मन भरून आलं की "माणसाला बोलायची किती इच्छा असते पण बोलता येत नसतं तरीही त्यांनी माझ्यासाठी घेतले परिश्रम हे खरंच कौतुकास्पद होते. त्यांचं नाव ते मला सांगू शकले नाहीत म्हणून मी त्यांच्या ओळ्खपत्राचा फोटो काढला व नंतर मुंबईत येऊन माझ्या कर्नाटकच्या मित्राला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांचं नाव "मनोहर". मनोहर काका तुमचे खूप खूप आभार.
३) महाविष्णू लेणी
ह्या लेणीची निर्मिती इसवी सन ५७८ मध्ये झाली आपला मोठा भाऊ कीर्तिवर्म ह्याने १२ वर्ष यशस्वी राज्य केल्याच्या आठवणी मध्ये ह्या लेणी ची निर्मिती झाली बदामी मधील हि सर्वात मोठी लेणी आहे
४) जैन लेणी
ह्या लेणी मध्ये २३ तीर्थंकर पार्श्वनाथ ह्यांचे प्रार्थना करतानाचे शिल्प आहे. ज्याच्या डोक्यावर पाच फण्याचा सापाचं शिल्प आहे. दुसरं शिल्प आहे ते म्हणजे बाहुबली. बाहुबली तीर्थंकर नसून त्याग किंवा निर्वाण स्वीकार केलेला श्रेष्ठ मानव आहे. तिसरं शिल्प आहे ते म्हणजे भगवान महावीर. ह्या लेणी मध्ये २४ तीर्थंकर असलेले एक शिल्प आहे.
१) बदामी वरून हंपीला जायचं झाल्यास बदामी हंपी थेट बस नसल्याकारणाने बदामी ते इल्कल व इल्कल ते हंपी अशी बस पकडावी.
दिवसाचा खर्च :-
बदामी लेणी प्रवेश फी :- २०/-
जेवण : - ५०/-
बदामी ते इल्कल बस :- ७०/-
इल्कल ते होस्पेट : - ११५/-
होस्पेट ते हंपी : - १५/-
रात्रीचे जेवण :- १५०/-
-------------------------
एकूण :- ४२०/-
बदामी कर्नाटक
चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात
सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी सुटायची वाट बघत बसलो. सव्वीस जानेवारीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चार दिवस सलग सुट्टी मिळाली होती. एवढी सुट्टी म्हणजे माझा जीव घरात रमणे अशक्य. मग कर्नाटकातल्या ऐतिहासिक जागांच्या सहलीचे नियोजन केले आणि निघालो. बदामी, पट्टदकल, आणि ऐहोळे यांसाठी दोन दिवस तर हम्पीसाठी दोन दिवस असा कार्यक्रम होता. या जागांविषयी बरेच ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला होता. सगळी जय्यत तयारी करून मी निघालो होतो. काहीतरी भन्नाट पहायला मिळणार आणि नेहमीच्या दिनचर्येतून चार दिवसांची सुटका होणार या भावनेने मी फारच उत्साहात होतो.तेवढ्यात चहावाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. बोचणाऱ्या थंडीवर उत्तम उतारा माझ्या समोर हजार होता. गरमागरम चहा घशाखाली गेल्यानंतर जरा तरतरी आली. नियोजित वेळेनुसार गाडीने प्रस्थान केले. एव्हाना उगवतीकडे तांबडं फुटू लागलं होतं. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयाचा प्रसन्न क्षण अनुभवत होतो. गाडीने जसा वेग पकडला तशी थंड हवा झोंबू लागली. मी मुकाट्याने खिडकी बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. गाडी तशी रिकामीच होती. समोरच्या सीटवर एक आजोबा अंगाचं मुटकुळं करून निवांत झोपले होते. मीही त्यांचा कित्ता गिरवत त्या मोकळ्या सीटवर आडवा पसरलो. भारतीय रेल्वेचा खडखडाट म्हणजे जणू बाळाचा पाळणाच! त्या हेलकाव्यांत छान झोप लागली. विजापूरला गाडीत गर्दी झाली. मग मात्र मला माझा सीटवरचा पसारा आवरता घ्यावा लागला. साधारण साडेअकराला बदामी स्टेशनवर उतरलो. बदामी हे कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्यातलं एक शहर. चालुक्यकालीन लेण्या आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध. मी हॉटेलवर जाऊन आन्हिकं उरकली आणि शहर बघायला बाहेर पडलो.
शहर तसं लहानसंच होतं. जेमतेम २५००० लोकवस्ती असेल. सगळी प्रेक्षणीय स्थळं अगस्त्य तीर्थाच्या आसपास एकवटलेली आहेत. माझ्या हॉटेलपासून तिथलं अंतर साधारण २ किमी असेल. एरवी सहज चालून गेलो असतो. पण इथलं दुपारचं ऊन सहन होत नव्हतं. सोलापुरातला गारठा कुठच्या कुठे पळाला होता. शेवटी रिक्षा केली. शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी दिसली आणि एका प्राचीन कमानीतून रिक्षा आत शिरली. आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा आभास झाला. उजवीकडे नितांतसुंदर असे अगस्त्य तीर्थ दिसत होते. तीर्थाच्या चहूबाजूंनी ताशीव कड्यांचे लाल पहाड रखवालदारांसारखे उभे होते. दक्षिणेकडच्या पहाडात बदामीची सुप्रसिद्ध गुंफा मंदिरे कोरलेली दिसत होती. शहराच्या बाजूने एक विस्तीर्ण घाट तीर्थात उतरत होता. त्याच्या समोरच्या बाजूला उभारलेले सुबक असे भूतनाथाचे मंदिर साऱ्या परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. मी रिक्षातून उतरलो. तीर्थाच्या काठाशी एक प्रचंड वटवृक्ष आपल्या पारंब्या सावरत उभा होता. त्या रणरणत्या उन्हात थोड्याफार सावलीचा तोच एक आधार होता. मी तिथे थांबून आता काय बघू, कुठून सुरुवात करू याचा विचार करू लागलो. इतक्यात शेजारचे वस्तुसंग्रहालय नजरेस पडले.
| बदामीचे सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिर |
उन्हापासून तात्पुरती सुटका म्हणून मी त्या वस्तुसंग्रहालयात शिरलो. अपेक्षेपेक्षा आतली मांडणी फारच नेटकी होती. उत्खननात सापडलेले अनेक अवशेष तिथे मांडले होते. त्यांपैकी मयूरतोरण आणि लज्जागौरी ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. एका दालनात चालुक्य साम्राज्याचा इतिहास चित्रात्मक पद्धतीने मांडला होता. कन्नड भाषेची सध्याची लिपी कशी उत्क्रांत झाली ती पक्रिया फारच आकर्षक पद्धतीने दाखवली होती. दुसऱ्या दालनात बदामी आणि परिसराची त्रिमितीय प्रतिकृती बनवलेली होती. दुर्भाग्याने आत फोटो काढायला मनाई होती. एकूण संग्रहालय लहानच होते. अर्ध्या तासात तिथून मी बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानातून बदामीविषयी माहिती असलेले एक लहानसे पुस्तक विकत घेतले. युरोपातल्या प्रसिद्ध जागांविषयी जशी इत्थंभूत माहिती इंटरनेट वर मिळते तशी भारतातल्या जागांविषयी मिळत नाही. शिवाय तिथे कोणी मार्गदर्शक सोबत घ्यायचा तर त्यालाही कितपत माहिती असेल याची काय शाश्वती? त्यामुळे मी सरळ पुस्तक वाचून पुढचा मार्ग ठरवायचा निर्णय घेतला. एका तथाकथित प्रमाणित मार्गदर्शकाने लिहलेले ते पुस्तक तसे माहितीपर होते. व्याकरणाच्या अनेक चुका असल्या तरी आसपासची आवश्यक माहिती त्यात होती. मी त्या वटवृक्षाखाली विसावलो आणि पुस्तक चाळू लागलो.
बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच “वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या सरोवरास अगस्त्य तीर्थ असे नाव मिळाले.
साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत.
त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती.
चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे
| उच्च शिवालयाकडे जाणारी वाट |
| एका दृष्टीकोनातून दिसणारी शिवालये |
| शिवालयाच्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य |
| गुंफा मंदिर क्रमांक चार |
| बाहुबली |
| वराह अवतार |
| वामनावतार |
बदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.
बदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथल्या लेण्या, भुतनाथ मंदिर व किल्ला पहाण्यासारखा आहे. ईथे आसपास पण पहाण्यासारखे बरेच काही आहे. जसे पट्टडक्कल, ऐहोळे, लाक्कुंदी ईत्यादी. हा सर्व परिसर पहायचा म्हणजे कमीतकमी ३ दिवस हवेत. बदामीला मुक्कामाला राहिलात तर ईथल्या KTDC च्या "मयुरा चालुक्य" ह्या हॉटेलमध्ये जरूर रहा. अतिशय शांत, रम्य व स्वच्छ परिसर आहे.
बदामीच्या लेण्या:
बदामीच्या लेण्या ह्या ६ व्या व ७ व्या शतकातल्या आहेत. ईथे एकूण ४ लेण्या आहेत. लेण्यांचे कोरीव काम चालुक्य शैलीतील आहे.
बदामीबद्दल सविस्तर माहिती ईथे पहावी.
http://www.flickr.com/photos/mukulb/5871950013/
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
भुतनाथ मंदिरः
हे ७ व्या शतकातील, चालुक्य शैलीतील मंदिर आहे. हे भुतनाथाचे (शंकर) मंदिर आहे. हे मंदिर एका रम्य तलावाकाठी बांधलेले आहे.
भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला
| भूतनाथ मंदिरे आणि अगस्त्य तीर्थ |
| मंदिरातला सुबक नंदी |
| अर्धवट बांधला गेलेला मंदिराचा कळस |
| डोंगरकड्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य |
![]() |
| कलत्या सूर्याच्या प्रकाशातले भूतनाथ मंदिर |
| बुरुजावरून दिसणारे अप्रतिम दृश्य |
![]() |
| बदामीचे चित्र रेखाटण्यात गुंतलेले चित्रकार आणि त्यांचे सुंदर कलाविष्कार |
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
बदामीच्या लेण्या:
प्रचि ३२
-
-
-
बदामीच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार:
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
किल्ल्यावरील एक मंदिर
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-

पट्टडकल
पट्टदकल
बदामी शहरातून बाहेर पडलो आणि बाईकने वेग घेतला. स्वच्छ उन पडलं होतं. सकाळची वेळ असल्याने उन्हाचा चटका फारसा जाणवत नव्हता. दक्षिण-मध्य भारतातला हा भाग म्हणजे तसा दुष्काळीच. अलमट्टी धरणामुळे इथे वर्षभर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे तसे दुर्भिक्ष नाही. मात्र अत्यल्प पर्जन्यमान असल्याने मोठे वृक्ष फार कमी दिसतात. सारा भूप्रदेश रेताड आणि खडकाळ दिसत होता. थोडीफार खुरटी झुडुपे दिसत होती. शेतांमधली कापणी नुकतीच झालेली असावी. त्यामुळे शेतेही उजाड दिसत होती. विजेच्या तारांवर वेड्या राघूंची (Green Bee Eater) लगबग सुरु होती. मध्येच एखादा नीलकंठ (Indian Roller) पंख पसरून मनोहारी निळाईचे दर्शन घडवत होता. दूरवरून ऐकू येणारा खंड्याचा कलकलाट इथे मी सुद्धा आहे असे ठासून सांगत होता.
![]() |
| पट्टदकल मधील मंदिर समूह |
अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही पट्टदकलला पोहोचलो. पट्टदकल हे बदामीसारखेच एक प्राचीन शहर. ग्रीक तत्त्ववेत्ता टॉलेमी याच्या Geography या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहलेल्या पुस्तकात या शहराचा उल्लेख सापडतो. पट्टदकल या नावाचा शब्दशः अर्थ होतो राज्याभिषेकाचा दगड. चालुक्य राजांनी सातव्या ते आठव्या शतकांच्या दरम्यान मलप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राज्याभिषेकादि शाही समारंभांसाठी हा मंदिरसमूह बांधला. उत्तरोत्तर विकसित होत गेलेल्या चालुक्य स्थापत्यशैलीचे अत्युच्च स्वरूप या मंदिरांत बघायला मिळते. या समूहात एकूण ९ मंदिरे आहेत. सारी मंदिरे पूर्वाभिमुख असून शिवाला समर्पित आहेत. दक्षिण भारतीय ‘द्राविड’ शैली आणि उत्तर भारतीय ‘नागर’ शैली यांचे सुरेख मिश्रण या मंदिरांत दिसून येते. हा समूह युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेला आहे. प्रथमदर्शनी तरी पट्टदकल एक टिपिकल भारतीय खेडेगाव वाटत होते. आपण बरोबर जागी आलोय की नाही असा प्रश्न पडावा इतके ते गाव लहान आणि अविकसित वाटत होते. मात्र मंदिरांचा परिसर नजरेस पडला आणि इथे काहीतरी वेगळीच दुनिया वसली आहे की काय असा आभास झाला. अपेक्षेनुसार इथेही भारतीय पुरातत्व विभागाने मंदिरांचा परिसर कुंपणाने संरक्षित केला होता. मंदिरांच्या आजूबाजूला सुंदर बागही फुलवली होती. मी तिकीट काढून आत शिरलो.
| काडसिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्या अग्रभागी असलेली नृत्यामग्न शिवाची मूर्ती |
![]() |
| संगमेश्वर मंदिर |
| गलगनाथ मंदिर |
| काशी विश्वेवर मंदिर आणि त्यावरचे जाळीदार नक्षीकाम |
| मंदिरातील अप्रतिम कोरीवकाम |
| विरुपाक्ष मंदिराचे प्रवेशद्वार |
![]() |
| खांबांवरील कलाकुसर |
पट्टडकल मलप्रभा नदिच्या काठी वसलेले आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामी. पट्टडकलला रहाण्याची काही सोय नाहीये. त्यामुळे मुक्कामास बदामीस उतरावे. पट्टडकल बदामीपासुन २२ किमी वर आहे.
पट्टडकल चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथे ७ व्या व ८ व्या शतकातील १० मंदिरांचा समुदाय आहे. यातील ४ मंदिरे ही द्राविड शैलीतील आहेत तर ४ मंदिरे नागरा शैलीतील आहेत. बाकी २ मिश्र शैलीतील आहेत. ह्या मंदिरांचा समावेश UNESCO च्या World Heritage sites मध्ये होतो.
आठवतील तेव्हड्या मंदिरांची नावे येथे देण्याच्या प्रयत्न मी केला आहे. कोणास अधिक माहिती असेल तर नक्की कळवा.
पट्टडकल बद्दल अधिक माहिती येथे पहावी: http://en.wikipedia.org/wiki/Pattadakal
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ४
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ५
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ९
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि १०
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि २८
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
जैन नारायण मंदिर
-
-
-
प्रचि ३८
जैन नारायण मंदिर
-
-
-
-
-
-
प्रचि ४०
-
ऐहोळे
मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे
| ऐहोळे येथील मुख्य मंदिरसमूह |
| दुर्गा मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना |
| दुर्गा मंदिराचे कोरीव स्तंभ |
| प्रदक्षिणा मार्ग |
| लाडखान मंदिर |
| लाडखान मंदिरातील कोरीव स्तंभ |
| अर्धनारीश्वर |
| रावणफडी गुंफा |
| नृत्यमग्न नटराजाचे महाकाय शिल्प |
| जैन गुंफांतील शिल्पे |
ऐहोळे बदामी पासुन ३३ किमी वर आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामीच. ही चालुक्य राजवटीची बदामी-पुर्व राजधानी होती. ह्या परिसरात चालुक्य राजांनी बांधलेली जवळपास १२५ मंदिरे आहेत. पण बरीच मंदिरे भग्न स्वरुपात आहेत. काही मंदिरांचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर आपली कुर्हाड ईथेच धुतली होती.
हा सर्व परिसर पहायला कमीत-कमी ५-६ तास तरी हवेत.
ऐहोळे बद्दल अधिक माहिती येथे पहावी.
http://en.wikipedia.org/wiki/Aihole
ईथे आठवतील तेव्हडया मंदीरांची नावे देतो आहे.
प्रचि १
दुर्ग मंदीरः
हे खरेतर देवीचे मंदीर नसुन शंकराचे मंदीर आहे. जवळच दुर्ग (किल्ला) असल्याने ह्याला दुर्ग मंदीर असे नाव पडले.
-
-
-
-
प्रचि २
-
-
-
-
प्रचि ३
-
-
-
-
प्रचि ४
मंदीराचा परिसर
-
-
-
-
प्रचि ५
-
-
-
-
प्रचि ६
-
-
-
-
प्रचि ७
-
-
-
-
लाडखान मंदीरः
प्रचि ८
-
-
-
-
प्रचि ९
-
-
-
-
प्रचि १०
-
-
-
-
प्रचि ११
-
-
-
-
रावणफाडी:
ही एका अखंड दगडात कोरलेली लेणी आहे.
प्रचि १२
-
-
-
-
प्रचि १३
-
-
-
-
प्रचि १४
-
-
-
-
प्रचि १५
-
-
-
-
प्रचि १५
-
-
-
-
प्रचि १६
-
-
-
-
प्रचि १७
-
-
-
-
प्रचि १८
-
-
-
-
प्रचि १९
-
-
-
-
प्रचि २०
हुचिमल्ली गुडी
-
-
-
-
प्रचि २१
-
-
-
-
प्रचि २२
-
-
-
-
प्रचि २३
-
-
-
-
प्रचि २४
मेगुती जैन मंदीर
-
-
-
-
प्रचि २५
-
-
-
-
प्रचि २६
-
-
-
-
प्रचि २७
-
-
-
-
प्रचि २८
-
-
-
-
प्रचि २९
-
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
-
प्रचि ३१
भव्य दिव्य मंदिराचा समूह पाहून डोळे विस्फारतात. मुर्त्या नसल्या तरी मंदिरांची स्थिती, त्यावरील कोरीवकाम, प्रसन्नता, भाव आजही त्या काळच्या शिल्पकाराच्या कलेचे ठसठशीत पुरावे आहेत. हि मंदिरे प्रचंड मोठी असून भक्कम आहेत. मंदिरांमधील खांबांवर नाजूक नक्षीकाम दिसते . अनेक प्राणी आणि विष्णू,शंकर, राम यांच्या जीवनावर आधारित अश्या अनेक पौराणिक कथा कोरल्या आहेत.
कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते. येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे सापडली आहेत; त्यांचा वापर येथील मंदिराच्या शिल्पकलेसाठी झाला असावा असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ‘ए गाइड टू जॉग्रफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे.
म्हणजे त्या काळात हे व्यापारीदृष्टय़ा प्रगत शहर असावे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात. (संदर्भ: विकिपीडिया)
२ तासात मंदिर दर्शन आटोपून मोर्चा ऐहोळेकडे निघाला. १० किमी चे अंतर ह्या तुळतुळीत रस्त्यावर काहीच नाही. अहीहोले मंदिर समूह म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची शाळा समजली जाते. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात. गेट मधून प्रवेश केल्यावर पहिलेच तुम्हाला आकर्षित करणारे दुर्गादेवी मंदिर दिसते. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुळाकृती आहे. दिल्लीतल्या संसद भावनासारखी दिसते. मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. सकाळ पासून नुसतीच मंदिरे पाहत असलो तरी आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणाहून येत होती.
जमदग्नीपुत्र परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा करून आपला रक्तलांछित परशू मलप्रभेच्या पात्रात धुतला तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. जनमानसाला सुशील, सत्शील करण्याचा हेतू त्यामागे दिसत होता. (संदर्भ: सौ. पौर्णिमा केरकर ह्यांच्या शिल्पकलेचा अनुपम आविष्कार मधून)
महत्त्वाच्या नोंदी :
दिनांक : २९-३०-३१ डिसेंबर २०१८
आजची भटकंती: दुपारी बदामी किल्ला पाहून झाल्यावर पट्टडकल - ऐहोले - होस्पेट - हंपी
पाण्याची व्यवस्था : सोबत पाणी असावे.
कसे जाल : पुणे सोलापूर हा मार्ग गुगल मॅप दाखवत असेल किंवा कमी किमी भरत असेल तरी एन एच ४ ने जाणे सोईचे पडते.
हे चुकवू नका : विरुपाक्ष मंदिराजवळ असणारा सनसेट पॉईंट आणि सनसेट. तुम्हाला झक्कास फोटो हवे असतील तर सूर्यास्त झाल्यावर १० मिनिटे थांबा मग आकाशात विविध रंगछटा उमटतात.
अडचणी : सारखी सारखी मंदिरच पाहावी लागतात त्यामुळे एखादा नास्तिक प्राणी सोबत असल्यास तो त्रास देऊ शकतो.
अजून :
१. संपूर्ण प्रवासात तुमचा गाडी ड्रायव्हर हुशार हवा. त्याला निघायच्या आधी पुरेशी झोप द्या.
२. ट्रेन ने प्रवास होईल पण तुमची कमी ठिकाणे होतील.
३. मुळात ही प्रत्येक ठिकाणे एका दिवसात संपणारी नाही आहेत, तरी जेवढे जमेल तेवढे बघा आणि व्यवस्थित बघा.
४. एकदा हंपी - बदामी मध्ये घुसलात कि मग व्हेज जेवण मिळते साधे पण अतिशय चविष्ठ.
५. विठ्ठल मंदिराजवळ गाईड न चुकता घ्या. (५०० रु. घेतो)
६. ट्रेन ने गेलात तर लोकल टमटम आहेत आपल्याकडे असतात तसे पण भाषा त्यांना समजत नाही त्यावेळी बरीच अडचण होते. पण आपल्याला कामचं करायचेय तर फक्त त्यांना ठिकाण - नाव सांगावे.
७. शक्यतो प्रयत्न करा एखादी कार घेऊन जा इनोव्हा टाईप ( ६ जण बसतात- ड्रायव्हर सोडून) किंवा स्वतःची बाईक.
८. खर्च: ३०-४० रु अशी एंट्री फी आहे वेगवेगळ्या ठिकाणी. जेवण - नाश्ता स्वस्त आहे. मुंबई - पुण्याच्या मानाने. हॉटेल ओयो वर बुक करा होस्पेट ला स्वस्त मिळतात.
९. ट्रेन ने गेलात तर लास्ट ठिकाण हुबळी. तेथून लोकल बस (स्वच्छ) बदामी - हंपी साठी सुटतात.
१०.. हॉटेल चा खर्च वाचवायचा असल्यास टेन्ट पण लावू शकता पण तुम्ही फ्रेश होणार नाही आणि मोठ्या ट्रिप ला फ्रेश नसलो कि चिडचिड होते.
११. कार ने गेलात तर पर हेड ४-५ हजारात काम होईल मुंबई ते मुंबई ( माझा अंदाज) (जेवण - नाश्ता - स्थळांची एंट्री फी - गाईड - ट्रॅव्हल - चटर:फटर खर्च)
१२. ट्रेन ने गेलात तर नॉन एसी २-३ हजार खूप होतील.
गाईड मिळतात.
जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे हा आमच्या भटकंतीमधला दुसरा दिवस, आदल्या दिवशी बदामीच्या गुहा, अगस्ती तलाव आणि यल्लमा मंदिर पाहिलेले होते आणि आजचा संपूर्ण दिवस ऐहोळे आणि पट्टदकलसाठी राखून ठेवला होता जेणेकरुन तिसर्या दिवशी कमी दगदग व्हावी. मात्र त्या तिसर्या दिवशीच्या भटकंतीत अनपेक्षितपणे सिदला फडीची दमदार भटकंती झाली त्यामुळे त्या दिवशी अधिकच दगदग झाली, बदामीच्या निकट असल्याने लिखाणात सलगता राहावी म्हणून बदामी किल्ला आणि सिदलाफडीवर आधी लिहिले आणि आता ऐहोळेची सुरुवत करत आहे.
तर आजचा दिवस होता ऐहोळे आणि पट्ट्दकलसाठीच. बदामीपासून पट्ट्दकल आहे साधारण २२ किमी तर ऐहोळे त्याच रस्त्यावर पुढे अजून १३ किमी. ऐहोळे साठी खरे तर २ दिवस आणि पट्टदकलसाठी किमान एक दिवस संपूर्ण हवा तरच ही ठिकाणे बर्यापैकी बघता येतात. मात्र वेळेअभावी तसे करणे शक्य नसल्याने एकाच दिवसात दोन्ही करायचे ठरवले आणि सकाळी लवकर उठून साधारण सात वाजता बाहेर पडलो. बदामीत एसटी स्टॅण्डजवळच्या हॉटेल उदय विलास मध्ये नाष्टा करुन निघालो ते वाटेत पट्टदकल पार करुन ऐहोळेत साधारण साडेआठच्या आसपास पोहोचलो. रस्ता एकदम मख्खन आहे. ऐहोळे-पट्टदकल येथे फिरताना वैयक्तिक वाहन नसल्यास बदामीपासूनच एखादी रिक्षा दिवसभरासाठी ठरवणे आवश्यक आहे कारण येथे सार्वजनिक वाहतुकीची तुलनेने बोंबच आहे आणि संध्याकाळी ५/६ च्या पुढे परतीसाठी वाहन मिळणे दुरापास्त होते. शिवाय ल़क्षात घेण्याजोगी अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःसोबत काही खाण्याच्या वस्तू आणि पिण्याचे पाणी विपुल असावे. ऐहोळेत फक्त दुर्गामंदिराच्या आसपास काही खाण्याची किरकोळ दुकाने आहेत, जेवण मात्र मिळत नाही. तिथल्या केटीडीसीच्या मयुरा विश्रामगृहात तयार काहीच नसते, तयार करुन देतात मात्र दिडेक तास थांबावे लागते. पट्टदकलला मात्र साधे कन्नड पद्धतीचे जेवण मंदिराबाहेरच्या टपर्यांवर मिळते, त्यादृष्टीने नियोजन करावे. तर चला आता ऐहोळेच सफर करावयास निघू.
ऐहोळे ही पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी. मलप्रभेच्या काठावर वसलेल्या ऐहोळे नगराचे प्राचीन नाव आर्यपूर असे मानले जाते. बदामीपासून मलप्रभा थोडी दूर असली तरी ऐहोळे आणि पट्टदकलला अगदी लगटून जाते. ही नदी मोठी अवखळ, हिचे पूर्वीचे नाव मलप्रहारी होते असे काही जण मानतात, मलाचा नाश करणारी नितळ, निर्मळ अशी. मात्र मला स्वतःला ह्या नदीचे पात्र मातकट, गढूळ असल्याने मलप्रभा अर्थात गढूळलेल्या पाण्याची असेच वाटते. मलप्रभेच्या काठावर ऐहोळेतील मंदिरसंस्कृतीचा विकास होत गेला. मंदिर निर्मितीची सुरुवात ऐहोळेतून झाली, बदामीत मध्य झाला तर पट्टदकलला संपूर्ण विकसित स्वरूपात मंदिरे उभारली गेली. ज्यांना कुणाला शिल्पशास्त्राच्या दृष्टीकोनातून मंदिर निर्मितीतला होत गेलेला बदल पाहायचा असेल, स्थित्यंतर अनुभवायचे असेल तर ते ऐहोळे, बदामी, पट्टदकलशिवाय संपूर्ण होणारच नाही. चालुक्य स्थापत्यशैलीची सुरुवात ऐहोळेपासून झाली, साधारण पाचव्या सहाव्या शतकापासून येथे मंदिरे उभारण्यास सुरुवात झाली किंबहुना दक्षिण भारतातील सर्वात आद्य मंदिरे ऐहोळे येथेच आहेत. गजपृष्ठाकार, मंडप, उतरत्या छपराची, फांसना शैली, द्राविड शैली, उत्तर भारतीय नागर शैली, लेणी अशी विविध पद्धतीची आणि जैन, बौद्ध आणि हिंदू आदी तिन्ही धर्मांची लहानमोठी मंदिरे बघावयास मिळतात अर्थात ऐहोळेत हिंदू मंदिरांची संख्या खूपच जास्त आहे. आजमितीस ऐहोळेत सुमार १२५ मंदिरे असून मंदिराच्या मध्येमध्येच गाव वसले आहे, जिकडे जावे तिकडे येथे काही ना काही पाहावयास मिळते. दुर्गा मंदिर येथील सर्वात प्राचीन असे मानले जाते, ह्याच मंदिरसंकुलात जवळपास ९९% लोक जातात आणि इतर संकुले मात्र पर्यटकांची वाट बघत एकांतावस्थेत असतात. ह्या सव्वाशे मंदिरांपैकी काही मंदिरसंकुले आम्हास पाहावयास मिळाली त्याबद्द्ल आता एकेक करुन पाहू.
जैन बसादी (जैन लेणी)
ऐहोळे गावात प्रवेश करण्याच्या आधी उजव्या हाताला एक टेकडी दिसते. तीच ही मेगुती टेकडी. गावात न जाता उजवीकडे टेकडीच्या कडेने एका लहानश्या रस्त्याने मागे वळल्यास एक खडकात खोदलेली एक लहानशी लेणी दिसते. तीच ही जैन बसादी. येथे नजर मात्र उजवीकडेच हवी नाहीतर आपण ह्या लेणीदर्शनास मुकू शकतो. येथे एक सांगणे अगत्याचे आहे की ह्या लेणीच्या वरच्या भागात म्हणजेच मेगुती टेकडीच्या पठारावर अश्मयुगीन दफनभूमी आहे(मोनोलिथिक डोल्मेन्स). येथूनच टेकडीच्या वरच्या पठारावर गेल्यास येथील पाषाणी दफनस्तंभ जवळून पाहता येतात. मेगुती टेकडीच्या दुसर्या बाजूस असलेल्या पायर्यांच्या मार्गाने गेल्यास मात्र सर्व बाजूंनी तटबंदी असल्याने हे डोल्मेन्स पाहायला उतरणे तसे जिकिरीचेच आहे.
बसादीचे होणारे प्रथमदर्शन
बाहेरुन अगदी लहानसे वाटणारे हे जैन लेणे आतून मात्र अगदी प्रशस्त आहे. एक पाषाणात खोदलेले हे लेणे अगदी ऐहोळेला येणार्यांनी अगदी आवर्जून पाहावे असेच आहे. सातवे शतक हा ह्या लेणीनिर्मितीचा काळ मानला जातो.
व्हरांडा, सभागृह आणि सर्वात शेवटी गर्भगृह अशी ह्याची रचना. व्हरांड्याच्या उजव्या भागात एका नागाचे छत्र धारण केलेल्या ( हा नाग म्हणजेच धरणेंद्र यक्ष) तीर्थंकर भगवान पार्श्वनाथांची मूर्ती कोरलेली असून बाजूस सेवक, सेविका आहेत. तर त्यांच्या समोरील बाजूस ( व्हरांड्याच्या उजव्या भागात) बाहुबली त्याच्या दोन सेविकांसह उभा आहे. निरखून पाहिल्यास बाहुबालीच्या पायांच्या बाजूस दोन नाग दिसतात तर पायांना वेलींनी विळखा घातलेला आहे.
पार्श्वनाथ
बाहुबली
ऐहोळे, बदामी, पट्टदकल येथील मंदिरांत, लेण्यांत फिरताना छताकडे कायम लक्ष जाणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. येथील जैन बसादीही त्याला अपवाद नाही. येथील संपूर्ण छत सुरेख नक्षीकामाने कोरून काढलेले आहे. छताची उंची कमी असल्याने येथे सर्वच छत कोरून काढणे हे तुलनेने सोपे गेले असावे हे सहजच लक्षात येते. कमळे, स्वस्तिक, मकर, मकराने अर्धवट गिळलेले मानव अशा विविध कलाकृतींची येथे रेलचेल आहे.
फुलांची नक्षी
स्वस्तिक
नक्षीकाम
व्हरांड्याच्या पुढे सभागृह, ह्याच्या छतावर कमळ कोरलेले आहे.
तर गर्भगृहात ध्यानमुद्रेत बसलेल्या भगवान महावीरांची मूर्ती आहे.
ऐहोळेला आल्यावर हे लेणे अगदी चुकवू नयेच, जेमतेम १०.१५ मिनिटात पाहता येते आणि वेगळे काही पाहिल्याचे समाधान मिळते.
येथून परत फिरुन आम्ही गावाच्या दिशेने निघालो वाटेत डाव्या बाजूला पहिलाच लागतो तो हुच्चयप्पा मठ
हुच्चयप्पा मठ
ऐहोळे गावाच्या अगदी सुरुवातीसच असणारे हे मंदिर येथे येणार्यांनी न चुकता आवर्जून पाहावे असेच आहे. एका प्रशस्त्र प्रांगणात हे मंदिर उभारले आहे. ह्या मंदिराची रचना थोडी निराळी. येथे मुख्य शिवमंदिर आणि एक मठ असे दोन विभाग आहेत. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एक प्रशस्त आयताकृती चर खणून त्यात ही दोन्ही मंदिरे स्थापित केली आहेत. मंदिरात शिरण्यासाठी आपल्याला काही पायर्या उतरुन खालचा प्रांगणात जावे लागते, तिथून एका अधिष्ठानावर हे मंदिर आहे. ह्या मंदिराची रचना मंडप शैलीची, चौकोनी आकारातली. गर्भगृहाच्या वर जो शिखर भाग आहे तो देखील चौकोनीच. साधारणतः सहाव्या शतकातले हे मंदिर त्यावरील युगुल मूर्तींमुळे प्रेक्षणीय झाले आहे.
हुच्चयप्पा मठ
प्रवेशद्वाराच्या समोरील दोन्ही बाजूस युग्मं शिल्पे आहेत तर आतील बाजूस गंगा, यमुना आहेत.
प्रेम आंधळं असतं असा आशय असणारे युगुल शिल्प यापैकी एक. येथे एक प्रेमात वेडा झालेला एक प्रियकर एका गर्दभमुखी तरुणीसोबत आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला सारासार विचारबुद्धी काही राहत नाही असेच सांगणारे हे शिल्प.
प्रवेशद्वाराच्या दुसर्या बाजूवरील हे एक शिल्प, स्त्रीच्या हातात पूर्ण भरलेल्या बांगड्या असून कमरपट्टा, बाजूबंद इत्यादी दागिने पाहण्यासारखे आहेत.
ह्या युगुलातल्या तरुणाची केशरचना आणि कमरेला बांधलेले वस्त्र इजिप्शियन वस्त्रशैलीशी कमालीचे मिळतेजुळते आहे. मस्तकावर अरब लोक पांघरतात तसे उष्णीष असून कमरेचे वस्त्र चुणीदार आहे.
मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूच्या सुरुवातीसही मैथुन शिल्पे आहेत.
--
प्रवेशद्वारातून आत जाताना दोन्ही बाजूस गंगा यमुना आहेत. दोन्ही सरितादेवींनी आपला प्रवाह हळुवार व्हावा म्हणून आधारासाठी बटूच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्यांच्या तलम वस्त्रांतून त्यांची नितळता प्रतीत होते.
गंगा यमुना
--
प्रवेशद्वारातून सभागृहामधे आत जाताच येथील सर्वात महत्वाची आश्चर्ये लपलेली आहेत. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नंदी हा स्वतंत्र मंडपात नसून सभागृहातच आहे. मी कित्येकदा आधी सांगितल्याप्रमाणे तुमची नजर छतावर गेलीच पाहिजे नाहीतर तुम्ही अगदी महत्वाच्या शिल्पांना मुकू शकता. येथील छतावर आहेत ते ब्रह्मा, विष्णू, महेशाचे तीन भव्य शिल्पपट, इतके सुंदर शिल्पपट मी याधी कुठेही पाहिले नाहीत. चला तर मग एकेक करुन हे शिल्पपट बघूयात.
विष्णू
पाच फण्यांच्या वेटोळे घातलेल्या शेषनागावर आरामात बसलेल्या विष्णूच्या हाती शंख आणि चक्र आहेत तर इतर दोन्ही हातांनी गुडघ्यांचा आधार घेतला आहे. शयनमुद्रेऐवजी वेटोळ्यावर बसलेली विष्णूमूर्ती हे चालुक्य शैलीचे एक खास वैशिष्ट्य. विष्णूच्या दोन्ही बाजूंना भूदेवी (पृथ्वी) आणि श्रीदेवी (लक्ष्मी) आहेत. एका बाजूस गरुड असून दुसर्या बाजूस एक सेवक आहे
शिव
हा येथील एक कमालीचा सुंदर शिल्पपट. नंदीवार स्वार शिवाने एका हाती नाग धरला असून दुसर्या हाती अक्षमाला आहे. शेजारी पार्वती बसली असून एका सेविकेने तिच्यावर छत्र धारण केले आहे. शिवाच्या बाजूस चामरधारी सेवक, शिवगण आणि अस्थिपंजर झालेला भृंगी आहे. पटाच्या बाजूस सुरेख नक्षीकाम असून कमळे आणि शिवगण कोरलेले आहेत.
ब्रह्मा
हंसावर आरुढ असलेल्या ब्रह्माची चार मस्तके ही चार वेदांची प्रतिके आहेत तर त्याने हातांमध्ये कमळ, पुस्तक, कमंडलू आणि अक्षमाला धारण केली आहे. उपासतापास, तपाने कृश झालेल्या सप्तर्षींनी त्याला वेढलेले आहे. ब्रह्मासोबत सप्तर्षी असलेले हे दुर्मिळ शिल्प. सप्तर्षींच्या वाढलेल्या जटा दाढ्या येथे कमालीच्या निगुतीने कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या गर्भगृहात ग्रॅनाईटचे शिवलिंग आहे. हे देखील येथील मंदिरांचे एक वैशिष्ट्य. येथील मंदिरे बांधली आहेत ती पिवळ्या वालुकाश्मातून जो येथे विपुल आहे, मात्र शिवपिंडी आहेत त्या जवळपास सर्वच ग्रॅनाईटमधल्या जो इथे मिळत नाही. गर्भगृहाच्या बाजूच्या कोनाड्यात मात्र एक वालुकाश्मातली शिवपिंड आहे आणि त्यावर सप्तमातृकापट कोरलेला आहे.
शिवपिंडीवरील सप्तमातृकापट
आता बाहेर येऊन मंदिराभोवतील एक फेरी मारली. अगदी सुरुवातीची शिल्पे वगळता मंदिराच्या तिन्ही भिंती अगदी साध्या आहेत.
मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असणारा मठ तर अगदी साधा. चौकोनी रचनेच्या ह्या मठात स्तंभ वगळता काहीही अवशेष नाहीत.
हे मंदिर बघून बाहेर आलो आणि ऐहोळेतील पुढची मंदिरे बघायला सुरुवात केली त्याबद्द्ल पुढच्या भागात.
महत्वाची टिप:
बदामी, ऐहोळे, पट्टदकल फिरताना दोन गोष्टी अत्यंत आवश्यक - पिण्याचे पाणी आणि एक उत्तम दर्जाचा टॉर्च. टॉर्चशिवाय येथील शिल्पे पाहताच येणार नाहीत इतक्या अंधारात आहेत. मी ह्या भ्रमंतीत सर्वच ठिकाणची छायाचित्रे मोबाईलवर काढली असल्याने शिल्पांवर फोकस करण्यासाठी मला टॉर्चचा चांगला उपयोग झाला. मी ह्यासाठी अॅमिसीव्हिजनचा टॉर्च वापरला. जो पुरेसा प्रकाश देणारा असून झूम कमी जास्त करता येणारा, शिवाय खिशात अगदी सहजी मावणारा असा आहे. ह्यासाठी १८६५० चे रिचार्जेबल सेल आणि चार्जरदेखील घेतला ज्याने प्रकाशाची तीव्रता अजून वाढते आणि जास्तवेळ बॅकअप मिळतो. ही ह्या टॉर्चची जाहिरात नसून येथे फिरण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त वस्तू म्हणूनच तिची माहिती येथे देत आहे. आपण आपल्याला हवा तो टॉर्च घ्या मात्र टॉर्चशिवाय येथे येऊ नका ही कळकळीची विनंती. मोबाईलच्या फ्लॅशलाईटचा प्रकाश येथे अजिबात पुरेसा नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
पाच मंदिरांचा असलेला हा समूह द्वित्रिकुटाचल पद्धतीत आहे अर्थातच त्रिदल गाभारा. ऐहोळेतील इतर मंदिरे जरी जुनी असली तरी हा मंदिरसमूह मात्र इसवी सनाच्या ११/१२व्या शतकात कल्याण चालुक्यांच्या राजवटीत निर्मिला गेला.
एका उंच अधिष्ठानावर निर्मित ह्या शिवमंदिराचे शिखर हे फांसना पद्धतीचे असून हा मंदिरसमूह एकमेकांना जोडला गेलेला आहे. रचीगुडी, मद्दिनागुडी ही येथील प्रमुख मंदिरं.
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
ह्या मंदिरसमूहात मूर्तीकाम जवळपास नाही, मात्र येथील बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे येथील मंदिरातील लेथ मशिनवर तासून काढल्यासारखे गुळगुळीत स्तंभ आणि ग्रॅनाईटपासून बनवलेल्या चकचकित शिवपिंडी. प्रवेशद्वारातील अर्धमंडप, स्तंभयुक्त सभामंडप आणि गर्भगृह अशी यांची रचना. हे मंदिर अगदी गावातच असले तरी येथे फारसे कुणी येत नाही आणि गाभार्यात वटवाघूळांचा वावर आहे त्यामुळे येथे अगदी कुबट वातावरण आहे. टॉर्च घेऊनच येथील अंधार्या गर्भगृहांमध्ये शिरावे.
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
द्वारशाखेवरील गजलक्ष्मीची मूर्ती प्रेक्षणीय आहे.
सभामंडप आणि तेथील गुळगुळीत स्तंभ
राचीगुडी मंदिराच्या शिखरभागावर लाडकी ओंडक्यांसारखे दगडी ओंडके आहेत. ऐहोळे, पट्टदकलला अशी रचना सर्रास आढळते.
दगडी ओंडके आणि फांसना पद्धतीची शिखररचना
सभामंडपाच्या छतावर कमळाकृती कोरलेल्या आहेत.
मंदिर संकुल
मंदिर संकुल
हे मंदिर बघूनच बाहेर आलो, रस्त्याच्या पलिकडच्या भागात अजून एक मंदिरसमूह आहे. तो मात्र जैन मंदिरांचा.
जैन मंदिर समूह (चरंथी मठ)
दक्षिणच्या चालुक्य, राष्ट्रकूट, होयसळ, यादव ह्या सर्वच राजवटी हिंदू असल्यातरी ह्यांचे कित्येक महाल हे जैनांतून आलेले होते. ह्यापैकी काही राजांनी जैन धर्म देखील स्वीकारला होता किंवा जैनांना राजाश्रय देखील दिला होता. साजहिकच ह्या राजवटींनी जैन मंदिरांची देखील उभारणी केली. त्यापैकीच एक मंदिरसमूह येथे आहे. चरंथी मठ ह्या नावाने ओळखले जाणारे संकुल ऐहोळेतील सर्वाधिक दुर्लक्षित मंदिरसमूह मानता यावा. ऐहोळेतील इतर बहुतेक मंदिरांचा परिसर स्वच्छ असला तरी येथे मात्र बरीच अस्वच्छता आहे. ऐन गावांत असल्याने हे मंदिर येथील रिकामटेकड्यांचा एक अड्डाच झाले आहे. तंबाखू, गुटख्यांची पाकिटं, बिडी सिगारेट्सची थोटके, खाद्यपदार्थांच्या फाटलेल्या पिशव्या येथे सर्रास आढळतात. पुरातत्त्व खात्याने नीट निगा न राखलेला हा एकच मंदिरसमूह मला येथे आढळला.
तीन जैन मंदिरांचा हा समूह फांसना शैलीत असून १२ व्या शतकात कल्याण चालुक्यांच्या राजवटीत बांधला गेला. चौकोनी सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना.
जैन मंदिर संकुल
मंदिराचे स्तंभ नक्षीकामामुळे देखणे दिसत आहेत.
महावीरांच्या ह्या मंदिरात दोन प्रवेशद्वारे असून प्रत्येक प्रवेशद्वारावर १२/१२ तीर्थंकरांच्या उभा मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला आसनस्थ जैन देवीची प्रतिमा आहे. ह्या मंदिरात आल्यावर ही शिल्पे बघणे अजिबात चुकवू नये.
प्रवेशद्वारारील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा
प्रवेशद्वारारील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा
आतील सभामंडप, गर्भगृहात महावीरांची मूर्ती आहे.
ह्या मंदिराच्या समोरचे जैन मंदिर मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे अतिशय अस्वच्छ आहे. बाहेरुन जरी हे छान दिसत असले तरी आतमध्ये ह्याची अवस्था वाईट आहे.
जैन मंदिराचा बाह्यभाग
जैन मंदिराचा बाह्यभाग
गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर महावीर असून बाजूला त्यांचे दोन सेवक आहेत.
गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती आहे. ही मूर्ती देखील ग्रॅनाईटमध्ये कोरलेली आहे.
हा मंदिरसमूह पाहून येथील पुढिल एका मंदिरसमूहाकडे निघालो. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर संकुल
मल्लिकार्जुन मंदिर संकुल
येथवर जवळपास साडेदहा वाजत आल्याने आणि ह्या पुढे दुर्ग मंदिर, रावणफडी, मेगुती टेकडीवरील जैन मंदिर आणि दुपारनंतर पट्टदकल येथील मंदिरे बघायची असल्याने वेळ मात्र अतिशय कमी उरला होता त्यामुळे ही मंदिरे झटपट बघून पुढे जाण्याचे ठरवले.
मल्लिकार्जुन मंदिरसमूह एका विस्तृत प्रांगणात आहे. पाच मंदिरांचा हा समूह फांसना पद्धतीत बांधला गेलेला आहे. येथील सर्वात जुने मंदिर आठव्या शतकातील वातापिच्या चालुक्यांच्या कारकिर्दित बांधले गेले असून शेवटचे मंदिर १२ व्या शतकांत कल्याण चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले आहे.
मल्लिकार्जुन मंदिर संकुल
एका उंच अधिष्ठानावर उभारल्या गेलेल्या ह्या मंदिरसंकुलांचे बांधकाम अपूर्ण दिसते किंवा कालौघात उद्वस्त झाले असावे. मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. द्वारपट्टीकेवर गजलक्ष्मीचे शिल्प असून सभामंडपातील स्तंभांवर वादक, नर्तकी, नृसिंह अशी शिल्पे आहेत.
मल्लिकार्जुन मंदिर समूहाचा पाठीमागचा भाग
येथे पुढ्यात अवशेष शिल्लक राहिलेला नंदीमंडप आहे. शिखर फांसना पद्धतीचे असून त्यावर आमलक आहे.
आतील स्तंभ आणि स्तंभशिल्पे
वेगेवगळ्या प्रकारची मंदिरशैली हे ऐहोळे येथील मंदिरांचे वैशिष्ट्य. दक्षिण भारतातील मंदिर परंपरा ऐहोळेपासून सुरु झाली असे मानता यावे. साहजिकच येथे प्राथमिक अस्वस्थेतील विविध प्रकारची मंदिररचना, शिखररचना आढळते. ऐहोळेस आल्यावर येथील विविध मंदिरे पाहात हे अवश्य जाणून घ्यावे. असेच उतरत्या छपरांच्या रचनेचे आणि फांसना पद्धतीच्या शिखराचे हे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिरसमूहाच्या आवारात एक विस्तीर्ण पुष्करिणी देखील आहे.
मंदिरसमूहातील एका मंदिरावर असलेली गजलक्ष्मी आणि नक्षीदार प्रवेशद्वारे
मंदिरसंकुल
मंदिरसंकुलातील अजून एक मंदिर
ह्या मंदिराच्या समोरच गौरी मंदिर आहे मात्र वेळेअभावी येथे जाता आले नाही, तर मंदिराच्या बाजूला ज्योतिर्लिंग मंदिर संकुल आहे, हा देखील एक मोठे समूह संकुल आहे मात्र येथील कुंपण कुलुपबंद केले असल्याने येथेही जाता आले नाही. मात्र बाहेरुन त्यांची काही काही छायाचित्रे घेता आली.
ज्योतिर्लिंग मंदिर संकुल - फांसना पद्धतीचे शिखर
ज्योतिर्लिंग मंदिर संकुल - मंडप रचना
मल्लिकार्जुन मंदिर संकुल हे मेगुती टेकडीचा उतार संपल्यावर लगेचच बांधले गेले असल्याने येथून मेगुती टेकडी, मेगुती किल्ल्याची तटबंदी आणि टेकडीच्या वरच्या बाजूस असणारे बौद्ध मंदिर अगदी सुरेख दिसते.
मेगुती टेकडी व बौद्ध मंदिर
येथे आपण जाणारच आहोत मात्र त्यापूर्वी येथील सर्वात प्रसिद्ध असे दुर्ग मंदिर आपल्याला पाहावयाचे आहे, त्याविषयी पुढील भागात.
क्रमशः
फांसना शैली म्हणजे एकावर एक वर निमुळत्या होत जाणार्या आकारात आडव्या दगडी स्लॅब्स बसवून केलेली रचना. ह्यात उभे अर्धस्तंभ किंवा लहान लहान शिखरांची रचना नसून एकावर एक ठेवलेल्या फासळ्या जशा दिसतील तशी रचना असते. प्रारंभीच्या नुसत्या आडव्या छतावरुन ही उत्क्रांत झालेली प्राथमिक शिखरपद्धतीची रचना.
दगडी ओंडके छतावर ठेवण्याचे कारण काय असावे
प्राचीनकाळी घरांचे, मंदिरांचे बांधकाम लाकडात असे. त्या रचनेशी साध्यर्म्य म्हणून असे लाकडाच्या ओंडक्यांसारखे दगडी ओंडके मंदिरांच्या छतांवर ठेवले गेले. हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले आहे, बौद्ध चैत्यगृहांची गवाक्षांची रचना ही त्याकाळच्या लाकडी प्रासादांच्या कामावरुन प्रेरीत होती. वेरुळ येथील १० व्या क्रमांकाच्या बौद्ध चैत्यगृहाला आजही सुतार लेणे म्हणतात हे विशेष.
ऐहोळे ३ - दुर्ग मंदिर संकुल
चला तर मग आता ह्या मंदिरसमूहाच्या सफरीला.
दुर्ग मंदिर
दुर्ग मंदिर हे सामान्यपणे दुर्गा मंदिर अर्थात दुर्गादेवीचे मंदिर असे चुकीचे ओळखले जाते. मूळात हे मंदिर सूर्य किंवा विष्णूचे आहे. गर्भगृहात आज मूर्ती नसल्याने नेमके सूर्याचे की विष्णूचे हे ठामपणे सांगता येत नाही मात्र एकंदरीत मंदिराच्या बाह्यभिंतीवर वैष्णव शिल्पे अधिक प्रमाणात आहे. मंदिराचे दुर्ग मंदिर हे नाव ह्या मंदिरसमूहाभोवती असणार्या दगडी तटबंदीवरुन पडले. जणू एखाद्या किल्ल्यात-दुर्गात हे मंदिर आहे. मात्र पुढे अपभ्रंश होऊन आज ते सर्वसामान्यपणे दुर्गा मंदिर म्हणूनच ओळखले जाते जे चुकीचे आहे.
ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेल्या शिलालेखानुसार ह्याचे निर्माण विक्रमादित्य द्वितीय (इस. ७३३-७४४) कारकिर्दित कोमारसिंग नाम व्यक्तीने केले. हा विक्रमादित्य द्वितीय हा विजयादित्याचा मुलगा. हे मंदिर पहिले भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक (साधारण पाचवे/सहावे शतक) मानले जात होते मात्र शिलालेखामुळे ह्याचा काळ आता सातव्या/आठव्या शतकातला मानला जातो. ह्या मंदिराची शैली एकदम आगळीवेगळी. ह्याचे साधर्म्य बौद्ध चैत्यगृहांशी आहे. गजपृष्ठाकार आकार असलेल्या ह्या मंदिराचे शिखर आज भग्न आहे मात्र त्याचे अवशिष्ट शिखर नागर शैलीत आहे. संसदभवनाचा आराखडा ह्याच मंदिरावरुन प्रेरीत होता असे म्हणतात. हे मंदिर पूर्वी प्राकाराने बंदिस्त असावे असे वाटते. आज मात्र फक्त प्रवेशद्वार शिल्लक राहिले असून बाजूचा कोट पूर्ण भग्न झालेला असावा. मंदिराच्या शिखराभोवती पूर्वी विटांचे बांधकाम होते असे संग्रहालयातील जुन्या छायाचित्रांवरुन समजते. आज मात्र ह्या विटा अस्तित्वात नसून फक्त शिखरभाग आहे. शिखरावरील आमलक हा मंदिराच्या बाजूलाच पडलेला आहे.
दुर्ग मंदिराचे प्रवेशद्वार
गजपृष्ठाकार दुर्ग मंदिर
दुर्गमंदिर समोरील बाजूने
गजपृष्ठाकर आकार असलेले हे मंदिर एका अधिष्ठानावर उभे असून अर्धमंडप, स्तंभयुक्त सभामंडप, त्यावरील विविध शिल्पे, अंतराळ,अर्धवर्तुळाकार गर्भगृह आणि सभामंडप व मंदिराचा बाह्यभाग ह्यांच्या मधल्या भागात असलेल्या प्रदक्षिणापथाने युक्त आहे.
मंदिराच्या द्वारस्तंभांवर विविध युगुलशिल्पे आहेत. त्यातीलच एक आहे तो अर्धनारीश्वर.
--
--
मी आधीच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे ऐहोळेला आल्यावर छतावर नजर टाकायला अजिबात विसरु नये. दुर्ग मंदिरातही छतावर अद्भूत नक्षीकाम केले आहे. छतावर एक चक्र खुबीने कोरलेले आहे. चक्रातील आरे लक्षपूर्वक पाहिल्यास ते मत्स्य आकृतींनी बनल्याचे पाहण्यात येईल. बदामीच्या प्रथम क्रमांकाच्या गुहेतील ओसरीतील छतावरदेखील असे नक्षीकाम आहे.
चक्र
ह्याच्याच पुढे आदिशेषाची एक अतिशय देखणी मूर्ती आहे.
तर अंतराळाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही हातांत नाग पकडलेल्या गरुडाची मूर्ती आहे. यावरुनच हे मंदिर विष्णूचे असावे असा तर्क सहज करता येतो.
द्वारावरील मूर्ती प्रेक्षणीय आहेत.
--
गर्भगृहात पीठासन असून आतमध्ये मूर्ती नाही. आता आपण गजपृष्ठाकर प्रदक्षिणामार्गातून फेरी मारण्यास सुरुवात करु. मंदिराचे सौंदर्य सामावले आहे ते ह्या मार्गावरील मूर्तींमध्ये. बदामी, ऐहोळे पट्टदकल येथील मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील विविध आकार असलेल्या खिडक्या. त्याला दुर्गमंदिरही अपवाद नाही. प्रदक्षिणापथावर जागोजागी स्वस्तिकाकार,जाळीदार, चक्राकार अशा विविध प्रकारच्या खिडक्या आहेत.
--
--
प्रदक्षिणापथावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सर्वात पहिली येते ती शिवाची.
अष्टभुज असलेल्या शिवाने हाती नाग, डमरु, अक्षमाला, फळ आदि धारण केले असून नंदीच्या मस्तकाचा त्याने आधार घेतला आहे. शिवाने येथे व्याघ्रचर्म परिधान केले असावे त्याच्या कमरेजवळच्या वाघाच्या मुखाच्या आकृतीने ते सहज स्पष्ट होते. एका शिवगणाने नंदीची शेपटी हातात धरली आहे.
ह्या नंतर येथे ते नृसिंहाची मूर्ती. बदामी परिसराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील उभ्या असणार्या केवल नृसिंहाच्या मूर्ती. येथे विदारण नृसिंह त्यामानाने अगदी कमीच दिसतात. कमरेवर हात ठेवलेल्या नरसिंहाने हातात शंख आणि चक्र धारण केले आहे. इतर दोन हात भग्न आहेत मात्र गदा आणि पद्म असावेत हे नक्की.
ह्यानंतर येते ती विष्णूची भव्य मूर्ती. शंख, चक्र धारण केलेल्या विष्णूच्या एका बाजूस लक्ष्मी आहे तर पुढ्यात सारथी गरुड आहे.
येथे काही देवकोष्ठांमधील मूर्ती गायब आहेत, त्या बहुधा भग्न झाल्या असाव्यात किंवा ब्रिटिशांनी परदेशी नेल्या असाव्यात, असेच मंदिराच्या गर्भगृहाच्या मागील वर्तुळाकार भागाच्या पुढे वराहमूर्ती आहे. हा विष्णूचा तिसरा अवतार. नरवराहाने हिरण्याक्ष्याने अपहरण केलेल्या पृथ्वीदेवीची सुटका केली असून तिला आपल्या मजबूत बाहूंच्या आधारावर तोललेली आहे. खालच्या बाजूस आदिशेषाची मूर्ती आहे.
ह्यानंतर येते ती महिषासुरमर्दिनीची देखणी मूर्ती. वाघावर आरुढ अष्टभुजा महिषासुरमर्दिनीने शंख, चक्र, घंटा, ढाल, खड्ग, पाश आदि आयुधे धारण केलेली असून हाताता त्रिशूळ पूर्णरूप असलेल्या महिषाच्या गळ्यात ती खूपसत आहे.
ह्यानंतर येते ती अष्टभुज हरिहराची मूर्ती. विष्णूचा मुकूट भरजरी आहे आणि शिवाचा जटायुक्त असून त्यावर अर्धचंद्र आहे. विष्णूच्या भागात लक्ष्मी असून शिवाच्या बाजूला शिवगण आहे. विष्णूच्या बाहूंवर दागिने असून शिवाच्या बाहूंवर रुद्राक्षमाला आहेत.
येथे आपली प्रदक्षिणापथावरुन प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराभोवती बाहेरुन प्रदक्षिणा मारतानाही गर्भगृहाच्या एकदम पाठीमागच्या भागात एक युद्धपट जगतीवरील आयताकार दगडावर कोरलेला आहे. शिल्पपट विदिर्ण झाल्यामुळे आज तो नीट ओळखता येत नाही मात्र महाभारत किंवा रामायण यापैकी एक असावा किंवा देवासुर संग्रामाचा असावा असे दिसते.
विदिर्ण शिल्पपट
दुर्ग मंदिर बाहेरील बाजूने
ह्या दुर्गमंदिराच्या बाजूलाच आहे ते कुटिर मंदिर
कुटिर मंदिर
हे अगदी लहानसे उतरत्या छपरांचा आकार असलेले झोपडीसारखे दिसणारे मंदिर. व्हरांडा, मुखमंडप, सभामंडप आणि गाभारा अशी ह्याची रचना. ह्याच्या खांबांची शैली बदामीतील भूतनाथ मंदिरातल्या स्तंभांशी साधर्म्य असलेली. बाहेरुन जरी अगदी लहानसे दिसत असले तरी आतमध्ये शिरल्यावर ते प्रशस्त वाटते. ह्याचे शिखर आज पूर्णपणे भग्न झालेले आहे. ह्याच्या बाजूलाच एक देखणी पुष्करिणी आहे.
ह्याच्या बाजूलाच आहे सूर्यनारायण मंदिर
सूर्यनारायण मंदिर
अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह ह्यांनी साकार झालेल्या ह्या सूर्यनारायण मंदिराचे शिखर द्राविड आणि नागर अशा मिश्र शैलीत आहे. द्वारशाखांवर गंगा आणि यमुनेची शिल्पे कोरलेली आहेत जी येथील परिसरावर मंदिरांत बहुतांशी दिसतात. आठव्या शतकात निर्मिलेल्या ह्या मंदिरात सूर्यनारायणाची एक भव्य मूर्ती आहे. पूर्णपणे ग्रॅनाइटमध्ये कोरलेली ही मूर्ती मूळची ह्या मंदिरातली वाटत नाही, ती येथे आणून ठेवल्यासारखी दिसते. कदाचित ती दुर्गमंदिरातील प्रमुख मूर्ती असावी असेही वाटते.
सूर्यनारायण मंदिर
दोन्ही हातात कमळे धारण केलेल्या सूर्याच्या दोन्ही बाजूस उषा आणि निशा आहेत. पायापांशी सात अश्व कोरलेले आहेत आणि मध्ये सारथी अरुण दिसतो.
सूर्यनारायणाच्या मंदिराच्या बाजूलाच दुर्ग संकुलातील दुसरे प्रसिद्ध मंदिर आहेत ते लाडखान मंदिर
लाडखान मंदिर (शिव मंदिर)
इस्लामिक काळात येथे कुणीतरी मुसलमान सरदार राहिल्यामुळे ह्या मंदिराला लाडखान हे नाव पडले व तेच आज रूढ आहे, वास्तविक ह्याला शिवमंदिर म्हणूनच ओळखले जायला हवे. हे मंदिर प्रसिद्ध आहे ते ह्याच्या मंडप पद्धतीच्या शिखरशैलीसाठी. चौकोनी आकारातील स्तंभयुक्त सभामंडप आणि चौकोनी आकारतल्याच गर्भगृहाने युक्त असलेल्या ह्या मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार येथील शिवलिंग नंतरचे असून येथे आधी कोणी दुसरी देवता असावी. मंदिराच्या चौकोनी शिखरभागाच्या भिंतींवर विष्णू, सूर्य आणि अर्धनारीश्वराच्या प्रतिमा आहेत. तर मंडपातील भिंतींवर गंगा, यमुना आणि युगुलशिल्पे आहेत. लाडखान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील छपरावर असणारे दगडी ओंडके, तसे हे येथे सर्वत्र दिसतात पण येथे त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते.
लाडखान मंदिर, एका बाजूस गंगा तर दुसर्या बाजूस यमुना आहे.
शिखरावरील विष्णूप्रतिमा
मंदिराच्या बाह्यभिंतीवर युगुलशिल्पे आहेत, त्यातील डावीकडील आहे ते रती मदनाचे, इक्षुदण्ड धारण केलेला मदन अगदी सहज ओळखू येतो.
मंदिराच्या भिंतीवर वेगवेगळ्या नक्षीची जालवातायने आहेत.
आतून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलते
--
गर्भगृहातील शिवलिंग
लाडखान मंदिराच्या बाजूला आहे ते गौडर मंदिर
गौडर मंदिर
हे बहुधा ऐहोळेतील सर्वात जुने मंदिर. हेही मंडप शैलीतले. आयताकार सभामंडप आणि आतील चौकोनी गर्भगृह. ह्या मंदिराचे शिखर आज अस्तित्वात नाही मात्र लाडखान मंदिरासारखेच ते असावे असे ह्याच्या उर्वरित भागावरुन दिसते. ह्याच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखावरुन हे मंदिर दुर्गा देवीचे असावे हे स्पष्ट होते. गौडर मंदिराला लागूनच एक भव्य पुष्करिणी आहे.
गौडर मंदिर
गौडर आणि लाडखान मंदिरे
ह्याच्या जवळच आहे ते चक्र मंदिर
चक्र मंदिर
रेखानागर शैलीतले हे मंदिर त्याच्या सुस्पष्ट नागर शैलीमुळे अगदी झटक्यात ओळखता येते. सभामंडप, रेखानागर पद्धतीचे शिखर आणि त्यावरील आमलक अशी ह्याची रचना. नवव्या शतकातले ह्या मंदिरावर फारसे अलंकरण नाही.
चक्र मंदिर
सभामंडप-चक्र मंदिर
ह्याच्याच बाजूला अगदी एका कोपर्यात आहे ते अगदी लहानसे बडिगेरा मंदिर
बडीगेरा मंदिर
फांसना पद्धतीचे शिखर असलेले हे ९ व्या शतकातले मंदिर सूर्यनारायणाचे असावे. मुखमंडप, सभामंडप अशी याची रचना. शिखराचा वरील भाग आज नष्ट झालेला आहे. छपरावर दगडी ओंडके आणि शिखराच्या भागावरील देवकोष्ठात सूर्याची मूर्ती आहे.
बडीगेरा मंदिर
येथे आपली दुर्ग संकुलातील सफर पूर्ण होते. ह्या संकुलातील प्रत्येक कोनांतून येथील मंदिरांचे नयनरम्य दर्शन होत असते त्याचीच काही प्रकाशचित्रे पाहूयात
ऐहोळेत आल्यावर हे दुर्ग संकुल तर सर्वजण पाहतातच मात्र येथील वस्तुसंग्रहालय पाहणे न चुकवण्याजोगे आहे. आतमध्ये चालुक्यकालीन मातृकांच्या अत्यंत भव्य प्रतिमा, आज त्यांची प्रचंड मस्तकेच येथे दिसतात, तसेच इतर कित्येक मूर्ती, मकरतोरणे, देवी देवता, शिखरशैलींच्या प्रकाराची ओळख, मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या आधीची छायाचित्रे तसेच येथील परिसराच्या नकाशाचे प्रारुप येथे आहे. दुर्ग मंदिर ते सांग्रहालय येथील आवारातही उघड्यावर येथे कित्येक मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यापैकी काही आपण येथे पाहू.
सप्तमातृका
ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा
--
वीरगळ
पुरुष पुरुष उंचीचे भले प्रचंड वीरगळ येथे आहेत.
--
--
गणेशाच्या विविध प्रतिमा
मकरावर बसलेला वरुण
हा प्रसंग नक्की कळत नाहीये, भृंगी, की शिवगण की भैरव?
खड्ग आणि ढाल हाती धारण केलेला वीरभद्र, डाव्या बाजूस खाली बकर्याचे मस्तक लावलेला प्रजापती दक्ष तर दुसरे बाजूस गणेश आहे.
येथे अगदी असंख्य मूर्ती आहेत मात्र विस्तारभयास्तव येथे अधिक छायाचित्रे न देता ह्या भागाची इथेच सांगता करतो. बदामी, ऐहोळे येथील यापूर्वीच्या भागातही मी आधी सांगितले तेच परत येथेही सांगतो. येथे मंदिरे पाहण्यासाठी टॉर्च अत्यंत आवश्यक. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या इथल्या गडद, अंधार्या गर्भगृहांमध्ये उपयोग नाही. आधी सांगितल्याप्रमाणे ऐहोळेत जेवण्याची व्यवस्था शक्यतो होत नाही मात्र दुर्ग मंदिराच्या बाहेर नारळपाणी, फळे, तसेच इडली वगैरे देणारे काही स्टॉल्स आहेत. तेथे पोटभर जरी नाही तरी थोडेसे काही नक्कीच मिळू शकते. पायपिटीमुळे पाणी अवश्य जवळ ठेवावे. आता ह्यापुढील भागात आपण रावणफडी, हुच्चीमली मंदिर आणि मेगुती टेकडी पाहून ऐहोळेतून बाहेर पडूयात.
क्रमशः
काही निरीक्षणे:
१. दगडांचे दोन रंग दिसतात
२. काही कोरीव काम अगदी फारच सुस्थितीत, टवकाही न उडालेले आणि काही अगदीच भग्न झिजलेले दिसते.
३. वीरगळावर आपल्या महाराष्ट्रातील वीरगळांपेक्षा खूपच जास्त तपशीलवार कोरीवकाम आहे.
केवल नृसिंह आणि विदारण नृसिंह म्हणजे काय? पोट फाडणारा का?
केवल नरसिंह म्हणजे नृसिंहाची एकल मूर्ती. तर विदारण नरसिंह म्हणजे नृसिंहाची हिरण्यकश्यपूचे पोट फाडतानाची मूर्ती. स्थौण नृसिंह म्हणजे खांबातून प्रकट झालेल्या नृसिंहाची मूर्ती यात हिरण्यकशयपूबरोबत युद्ध सुरु असताना दिसते, लक्ष्मी नृसिंह, योग नृसिंह असेही काही प्रकार आहेत.
काही निरीक्षणे:
इकडील दगडांचा पोत वेगळा आहे, लाल, गुलाबी, तांबूस, करडे, काळसर असे विविध रंग दिसतात. वालुकाश्म असल्याने कोरणे अतिशय सोपे जाते मात्र हा दगड ठिसूळ असल्याने बाह्य वातावरणामुळे ह्यांची झीजही लवकर होते त्यामुळे काही मूर्ती सुस्थितीत तर काही झिजलेल्या दिसतात. शिवाय इकडचे वीरगळ राजाश्रयाखाली कोरले गेलेत शिवाय वालुकाश्म असल्यामुळे त्यामुळे ह्यांवर लेख आणि निगुतीने केलेले कोरीवकाम आढळते तर महाराष्ट्रातील वीरगळ हे कठीण बसाल्ट दगडात कोरले गेले असल्यामुळे रेखीवता तुलनेने कमी प्रमाणात आढळते.
रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर
मंदिरनिर्मितीची प्रयोगशाळा असणार्या ऐहोळे गावात सुमारे सव्वाशे मंदिरं आहेत, मात्र पुरेशा वेळेअभावी मोजकीच मंदिरं पाहता आली. इथलं सर्वात महत्वाचं दुर्ग मंदिर संकुल जे आपण मागच्याच भागात पाहिलं, ह्या संकुलाच्या समोरच अजून एक मंदिर संकुल आहे ते मात्र न पाहता आम्ही इथून जवळच असलेल्या एका गुहामंदिराकडे जाण्यास निघालो ते आहे रावणफडी.
रावणफडी
रावणफडीची रचना ऐहोळेतच असलेल्या जैन लेणीसारखीच आहे. मात्र हे आहे
शैवलेणे. वेरुळ येथील रामेश्वर लेणीची प्रेरणा ऐहोळेतल्या रावणफडीवरुनच
घेतलेली असावी असे मानण्यास पुरेसा वाव आहे इतके साधर्म्य ह्या दोन
लेणींमध्ये आहे. अर्थातच तसेही राष्ट्रकूटांनी केलेली बरीचशी बांधकामे
बदामीच्या चालुक्यांच्या स्थापत्यावरुनच प्रेरित आहेत. काळानुसार
स्थापत्यशैलीही विकसित होते जाते, ऐहोळेतील सुरुवातीच्या काळात हळूहळू
विकसित होत असलेली स्थापत्यशैली आपल्याला पट्टदकलमध्ये पूर्णपणे विकसित
झालेली आढळते तर नंतरच्या राष्ट्रकूटांनी वेरुळच्या कैलास मंदिराद्वारे
ह्या शैलीला अद्वितिय केले.
साधारण सहाव्या शतकात खोदली गेलेले हे रावणफडीचे शैवलेणे बदामीच्या
चालुक्यांच्या कालखंडात कोरले गेले. एकाच पाषाणात खोदले गेलेले हे लेणे
लहानसे असले तरी ते परिपूर्ण आहे ते येथील मूर्तीकलेमुळे. हे येथील सर्वात
जुने लेणे, पुलकेशी पहिला ह्याच्या कालखंडात इकडील भव्य पाषाणखंड कोरुन
ह्या लेण्याचे निर्माण करण्यात आले.
समोर भव्य पटांगण असलेल्या ह्या लेणीच्या सुरुवातीलाच एक स्तंभ आहे आणि लेणीच्या मुख्य द्वाराच्या पुढ्यात एक नंदी आहे, त्याच्यापाशीच कळसाचा एक आमलक पडलेला आहे मात्र तो ह्या लेणीतील नसून जवळपासच्या एखाद्या मंदिराचा असावा हे नक्की. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला लहानसे उपमंडप किंवा उपमंदिरे आहेत. लेण्यांचे प्रवेशद्वार फक्त चारच खांबांवर तोललेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कुबेरमूर्ती आहेत. ह्यापैकी एका बाजूस आहे तो कमळ हाती घेतलेला पद्मनिधी तर दुसर्या बाजूस आहे तो शंख हाती घेतला शंखनिधी. कुबेर हा देवांचा खजिनदार अर्थातच निधी.
रावणफडी
रावणफडी प्रवेशद्वार (पद्मनिधी आणि शंखनिधी)
लेण्यात आत प्रवेश केल्यावर भव्य सभामंडप आणि सभामंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या ओवर्यांत शिल्पपट आहेत तर समोर गर्भगृहात शिवलिंग आहे. छतावर सुरेख नक्षीकाम आहे.
सभामंडप
सभामंडपाच्या उजवीकडे शिवतांडव अर्थात नटेशाचे सुरेख शिल्प आहे. नृत्य करणार्या शिवाने हाती नाग, डमरु, त्रिशूळ आदी धारण केले असून एका बाजूस पार्वती तर दुसर्या बजूस गणेश आहे. नागबंधन असलेल्या शिवाचे कमरेचे गजचर्म विलक्षण नजाकतीने कोरलेले आहे, त्याच्या चुण्या खूपच सुरेख दिसतात.
नटराज आणि सप्तमातृका
शिवतांडव
नटराजाच्या दोन्ही बाजूस सप्तमातृका आहेत. विशेष म्हणजे हा मातृकांचा पट एकत्रित नसून एका बाजूस चार तर दुसर्या बाजूस तीन असा आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मातृका बसलेल्या नसून उभ्या आहेत शिवाय त्यांची विशिष्ट लांच्छने येथे नसल्याने त्या नेमक्या कोण हे ओळखणे चामुंडा आणि वाराहीशिवाय अवघड आहे.
मातृका
ब्राह्मणी (कमंडलू धारण केलेली), माहेश्वरी, कौमारी आणि भयप्रद दिसणारी चामुंडा
तर ह्यांच्या समोरील बाजूस आहेत वाराहमुखी वाराही, वैष्णवी आणि ऐन्द्राणी
गर्भगॄहाच्या दोन्ही बाजूस शैवद्वारपाल आहेत तर एक हरिहराची मूर्ती देखील आहे.
शैव द्वारपाल आणि हरिहर
सभामंडपाची दुसरी बाजू म्हणजे नटराजाच्या शिल्पपटासमोरील बाजू मात्र अर्धवट राहिलेली आहे.
गर्भगृहात प्रवेश करताना एका बाजूच्या कोनाड्यात पृथ्वीस तोलून धरलेल्या नरवराहाची सुरेख मूर्ती आहे.
तर ह्याच्या समोरील बाजूच्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे.
गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग एका पीठावर स्थापित झाले असून एकपाषाणी आहे.
प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस म्हणजेच सभामंडपातून परत बाहेर पडताना द्वाराच्या दोन्ही बाजूस सुरेख मूर्तीपट आहेत. त्यापैकी एक आहे अर्धनारीश्वर
शिवपार्वतीची ही संमीलनमूर्ती. शिवाच्या अर्ध्या बाजूस जटामुकुटावर चंद्रकोर आहे तर पार्वतीचा मुकूट भरजरी आहे. शिवाने हाती त्रिशूळ आणि नाग धारण केला असून पार्वतीने बांगड्या परिधान केल्या आहेत. शिवाने चुणीदार गजचर्म परिधान केले असून पार्वतीने नक्षीदार कटीवस्त्र नेसलेले आहे. शिवाचे पाय अनावृत्त असून पार्वतीने पायात नक्षीदार कंकणे घातलेली आहेत.
अर्धनारीश्वर
तर प्रवेशद्वाराच्या आतील दुसरे बाजूस आहे तो गंगावतरणाचा देखावा
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून हाडांचा सापळा झालेला भगीरथ एका पायावर उभा राहून शिवाची घनघोर तपश्चर्या करत आहे. शिवाच्या उजव्या बाजूस पार्वती उभी आहे तर शिवाच्या पायांच्या खालचे बाजूस पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र मुक्तीची याचना करीत आहेत तर बाजूला शिवगण आहेत. प्रकट झालेली गंगा आपल्या तीन मुखांनी पृथ्वीवर येण्यासाठी तयार झाली आहे. ही तीन मुखे म्हणजे गंगा, भागीरथी आणि अलकनंदा. गंगेच्या ह्या त्रिरूपास त्रिपथगा असे म्हणतात म्हणजे तीन पथांनी मार्गस्थ झालेली. त्रिपथगेचा जोरदार प्रवाह आपल्या मस्तकावर अडवून संथ करण्यासाठी शिव उभा आहे.
गंगावतरण
सभामंडपातून दिसणारा बाह्य देखावा
इथे आपली रावणफडी लेण्याची सांगता होते. ऐहोळे-बदामी परिसरातले सर्वात जुने असलेले हे लेणीमंदिर सर्वात जुने असल्याने ऐहोळे येथे न टाळता येणार्या मंदिरांपैकी एक आहे.
आता आपण जाऊयात ते येथून अगदी जवळच असलेल्या अजून एका जुन्या मंदिराकडे, ते म्हणजे हुच्चीमल्ली मंदिर
हुच्चीमल्ली मंदिर
ऐहोळेला येणारे कित्येक पर्यटक हे शिवमंदिर पाहात नाहीत, एकतर हे मंदिर ऐहोळेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे तसेच रस्त्याच्या काहिश्या आत असल्याने चटकन दिसत नाही, मात्र रावणफडी बघायला आल्यास तेथून हे मंदिर सहजच नजरेस भरते ते त्याच्या रेखानागर पद्धतीच्या शिखरामुळे. एका उंच अधिष्ठानावर निर्मित हे मंदिर हे साधारण सातव्या शतकातले आहे आणि मुखमंडप, रंगमंडप अथवा सभामंडप आणि गर्भगृह ह्यांनी परिपूर्ण आहे. पश्चिमाभिमुखी असलेल्या ह्या मंदिरात संध्याकाळच्या वेळी सूर्यकिरणे थेट आतमध्ये प्रवेश करतात आणि मंदिर अगदी झळाळून निघत असते. मलप्रभा नदीकाठापासून हे मंदिर लांब असल्याने दुर्गामंदिर संकुलाप्रमाणेच ह्या मंदिराच्या पुढ्यात एक सुरेखशी बांधीव पुष्करिणी आहे.
रावणफडीपासून दिसणाअरे हुच्चीमल्ली मंदिर
मंदिराच्या पुढ्यात असणारी पुष्करिणी व त्यावरील विविध देवतांची शिल्पे
मंदिराचे शिखर रेखानागर पद्धतीचे असून शिखरावर आमलक आहे. नागर शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे कळसाच्या खाली आमलक असणे हे तर आपल्याला आता माहितच आहे. शिखरावर शिवतांडवाची मूर्ती आहे. मंदिराला लागूनच अजून एक उपमंदिर आहे ज्याचे शिखर फांसना शैलीत आहे.
हुच्चीमल्ली मंदिर
हुच्चीमल्ली मंदिराचे मुखदर्शन व शेजारील लहान मंदिराची फांसना शिखरशैली
मी मागेच सांगितल्याप्रमाणे ऐहोळे, बदामी आणि पट्टदकल येथील मंदिरे बघताना छतावर नजर टाकण्यास अजिबात विसरायचं नाही. हुच्चीमल्ली मंदिराच्या मुखमंडपातील छतावर देखील एक अद्भूत मूर्ती आहे ती म्हणजे कार्तिकेयाची. मयुरावर आरूढ कार्तिकेय राक्षसांचा संहार करताना दाखवलेला आहे. साथीला त्याचे पार्षद गण आहेत. कार्तिकेयाच्या अशा गतिमान मूर्ती तशा दुर्मिळ आहेत.
कार्तिकेय
मुखमंडपातून आत गेल्यावर रंगमंडप आणि आतमध्ये अंतराळ आणि गर्भगृह आहे जे प्रचंड अंधारात आहे. हुच्चीमल्ली मंदिर अगदी सुरुवातीच्या मंदिरांपैकी एक असल्याने येथेही प्रदक्षिणापथ हा सभामंडपातून गर्भगृहाभोवती फेरी मारतो. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गरुडमूर्ती आहे. तसेच द्वारावर गंगा यमुना आणि द्वारपाल आहेत.
अंतराळ, गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ
कूर्मारुढ यमुना
मकरारूढ गंगा
प्रदक्षिणापथावरुन फिरताना गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर असणारी असंख्य शिल्पे प्राणी पक्षी, नक्षी, देवता आदी नजरेस दिसतात. मंदिरांछ्या बाह्यभितींवर मात्र शिल्पांचे प्रमाण कमी आहे. ऐहोळेतील इतर मंदिरांप्रमाणेच ह्या मंदिरावरही शिलालेख आहेत.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील शिल्पे
शिलालेख
मंदिराचे एका आगळ्या कोनातून होणारे सुरेख दर्शन
मंदिराच्या समोरील बाजूस कल्याण चालुक्यांच्या काळातील एक मंदिरवजा मंडप आहे मात्र आत काहीही नाही.
येथे आपले हुच्चीमल्ली मंदिर संपूर्ण पाहून होते व आम्ही आता निघतो ते आमच्या ऐहोळेतील शेवटच्या ठिकाणाकडे ते म्हणजे मेगुती टेकडीवरील मंदिरांकडे त्याविषयी पुढच्या भागात,
क्रमशः
ऐहोळे ५: मेगुती टेकडीवरील बौद्ध, जैन मंदिरे आणि अश्मयुगीन दफनस्थळे
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह
ऐहोळे ४: रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मेगुती टेकडी हे ऐहोळेतील सर्वात उंच ठिकाण. ऐहोळेतील कोणत्याही मंदिरातून मेगुती टेकडी सतत दिसत असते. आपण ऐहोळेतील पहिल्या भागात जे जैन लेणे पाहिले तेही आहे ह्या मेगुती टेकडीच्याच पायथ्याला. ऐहोळेतून जाणार्या मुख्य रस्त्यावरुनच मल्लिकार्जुन मंदिराच्या अलीकडून मेगुती टेकडीकडे जाणारी वाट आहे. तसेही ह्या टेकडीवर जाण्यासाठी असंख्य वाटा आहेत, कुठूनही चढता येते मात्र टेकडीवर असलेल्या तटबंदीमुळे मुख्य जैन मंदिरात जाणे तसे अवघड होईल.
ह्या टेकडीवर आहेत तीन आकर्षणे, एक म्हणजे टेकडीच्या पाऊण उंचीवर असलेले बौद्ध लेणे, टेकडीच्या वर असलेले जैन मंदिर आणि टेकडीवर इतस्ततः विखुरलेली अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे.
मल्लिकार्जुन मंदिराच्या अलीकडून डांबरी रस्त्यावरुन एक कच्चा रस्ता मेगुती टेकडीवरील पायर्यांकडे जातो. इथे उन्हातान्हात बैल बांधलेले दिसतात आणि एकंदरीत अस्वछता दिसते.
हुच्चयप्पा मंदिराच्या इथून दिसणारी मेगुती टेकडी आणि त्यावरील तटबंदी
मेगुती टेकडीवर जाणार्या पायर्या व वर दिसणारे बौद्ध लेणे
बौद्ध लेणे
दक्षिण भारतात बौद्ध लेणी दुर्मिळ. बौद्ध लेण्या बहरल्या त्या मुख्यतः महाराष्ट्रातच. साधारण पाचव्या सहाव्या शतकानंतर त्यांचा सरता काळ सुरु झाला. ऐहोळेतील कोरली गेलेली बौद्ध लेणी आहे हे ती बौद्धकाळाच्या अस्तावेळची, साधारणतः सहाव्या शतकाच्या अखेरीसची. येथील बौद्धलेणे दुमजली आहे. लेणीसमोरच्या प्रांगणातच एक मस्तकविहिन बुद्धाची मूर्ती आहे, जी बहुधा आतल्या गर्भगृहातील असावी. लेणीच्या दोन्ही मजल्यांचीच छते प्रत्येकी चार पूर्णस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांवर तोललेली आहेत. स्तंभांवर शिलालेख आहेत. ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी यांची रचना.
बौद्ध लेणी
स्तंभलेख
ओसरीतील छतावर कमलासनावर बसलेली बुद्धप्रतिमा आहे, तिच्या मस्तकी तिहेरी छत्र आहे.
गर्भगृहात काहीही नाही मात्र तिथे वटवाघळांचा वावर प्रचंड असल्याने प्रचंड कुबट वास येत असतो त्यामुळे शक्यतो आत जाणे टाळावे.
लेणीच्या वरच्या मजल्यावर ओसरीच्या बाहेरुन एका अंगाने वाट आहे पण वरच्या मजल्याची रचनाही खालच्याप्रमाणेच असून आत काहीही पाहण्यासारखे नाही.
लेणीच्या पुढ्यातून ऐहोळे गाव आणि मल्लिकार्जुन मंदिर संकुलाचे सुरेख दर्शन होते.
बौद्ध लेणे पाहूनच अजून काही पायर्या चढून आपण माथ्यावर पोहोचतो. हा आहे ऐहोळेचा किल्ला आणि त्यात वसलेले आहे जैन मंदिर
जैन मंदिर
मेगुती टेकडीचा माथा बराचसा सपाटीचा आहे, माथ्याचा विस्तार जरी बराच बसला तरी तिचा थोडकाच भाग तटाबुरुजांनी बंदिस्त केलेला असून ह्याच भागात आहे ते मेगुतीचे जैन मंदिर. हे जैन मंदिर शक संवत् ५५४ (इ.स.वी. सन ६३२) मध्ये जैन साधक आणि कवी रविकिर्ती याने निर्माण केले. तसा शिलालेखच ह्या मंदिरावर त्याने कोरून ठेवलाय जो भारतातील सर्वाधिक महत्वाच्या शिलालेखांपैकी एक मानला जातो तीच आहे सुप्रसिद्ध ऐहोळे प्रशस्ती.
हे मंदिर ऐहोळेतील अगदी सुरुवातीच्या मंदिरांपैकी एक असल्याने ह्याची रचना देखील सुरुवातीच्या मंदिरांसारखी आगळीवेगळी अशी मंडप शैलीची. दुमजली असलेल्या ह्या मंदिरात स्तंभयुक्त मुखमंडप असून सभामंडपातून आतल्या गर्भगृहात जाता येते. गर्भगृहात आसनस्थ महावीरांची मूर्ती असून आजूबाजूला काही मूर्तींचे अवशेष विखुरलेले आहेत. सभामंडपातून्च मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाता येते, मात्र तिथे पडझड झाली असल्यामुळे संभाळून वर जावे लागते. वरच्या भागात काहीही नाही.
मेगुती जैन मंदिर
जैन मंदिर
जैन मंदिर मागील बाजूने
जैन मंदिर
मुखमंडप
सभामंडप
गर्भगृह
मंदिराच्या डाव्या बाजूस आहे तो उपरोल्लेखित रविकिर्तीने कोरुन घेतलेला सुप्रसिद्ध शिलालेख ज्यात पुलकेशी द्वितीय ह्याची प्रशस्ती गायली गेली आहे जी ऐहोळे प्रशस्ती ह्या नावाने विख्यात आहे.
ऐहोळे प्रशस्ती
ऐहोळे प्रशस्तीविषयी आपण बदामीच्या पहिल्या भागात अल्पसे वाचले असेलच. हा शिलालेख शुद्ध संस्कृतात असून ह्याची शैली पद्यमय असून शब्दरचना साहित्यिक आहे. अलंकारशास्त्रासाठी ही प्रशस्ती प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखाची सुरुवात जैन भिख्खू जैनेंद्र ह्याच्या प्रार्थनेने सुरु होऊन ह्यात चालुक्यांच्या प्रारंभिक शासकांचा उल्लेख येतो आणि त्यानंतर चालुक्य पुलकेशी ह्याचे गुणवर्णन गायले असून त्याच्या सैनिकी विजयांचे काव्यमय भाषेत सुरेख वर्णन येते. ज्यात पुलकेशीचा हक्क डावलून अन्यायाने राजा झालेल्या काका मंगलेशाच्या संहाराचे वर्णन असून कदंब, कोंकण मौर्य, लाट, मालव, गुर्जर ह्यांच्या पराभवाचे वर्णन येते. हर्षवर्धनासारख्या महापराक्रमी सम्राटाची हस्तिसेना नष्ट करुन त्याला हर्षरहित केल्याचे वर्णन करताना रविकिर्तीचे शब्द आटत नाहीत. ह्यानंतर पुलकेशीचे अजून गुणवर्णन करताना त्याने केलेल्या हाडवैरी पल्लवांच्या पराभवाचे वर्णन येते. त्यानंतर चोळ, पांड्य व केरलांनीही पुलकेशीचे मांडलिकत्व पत्करल्याचा उल्लेख येतो. पुलकेशीचे वर्णन त्याने 'सत्याश्रय' असे केलेले आढळते.
सभामंडपाच्या मध्यभागात जो काळा आयताकृती चौकोन दिसत आहे तीच आहे ऐहोळे प्रशस्ती
बदामीच्या पहिल्या भागात प्रशस्तीमधील काही श्लोक दिलेले असल्याने सर्व प्रशस्ती न देता काही अलंकारयुक्त श्लोक येथे देतो.
पिष्टं पिष्टपुरं येन जातं दुर्ग्गमदुर्ग्गमम्
चित्रं यस्य कलेर्वृत्तम् जातं दुर्ग्गमदुर्ग्गमम्॥
त्याने पिष्ठपुर नगराचे पीठ केले, त्या दुर्गयुक्त नगराला दुर्गरहित केले, त्याची चित्तवृत्ती अशी दुर्गम होती की ज्यात कलिवृत्तीचा प्रवेशही होणे दुर्गम होते.
उत्साहप्रभुमन्त्रशक्तिसहिते यस्मिन्समस्ता दिशो जित्वा भूमिपतीन्विसृज्य महितानाराद्धय देवद्विजान्।
वातापीन्नगरीप्रविश्य नगरीमेकामिवोम्मिमाम् चञ्चन्नीरधिनीलनीरपरिरखां सत्याश्रये शासति॥
उत्साह, प्रभुत्व आणि मंत्रशक्तीने युक्त असलेल्या पुलकेशी समस्त दिशा जिंकून जिंकलेल्या राजांना सोडून देवता आणि द्विजांची पूजा करुन वातापि नगरात प्रवेश केला. चंचल जलांनी घेरलेल्या पृथ्वीसमान ह्या नगरीवर सत्याश्रयाने शासन केले.
ह्या नंतर येतो तो महाभारताचा उल्लेख असलेला सुप्रसिद्ध श्लोक. ज्यात भारती युद्धाचा काळ वर्णित केला आहे.
त्रिशंत्सु त्रिसहस्रेषु भारतादाहवादितः।
सप्ताब्दशतयुक्तेषु गतेष्वब्देषु पञ्चसु॥
पञ्चाशत्सु कलौ काले षट्सु पञ्चशतासु च।
समासु समतीतासु शकानामपि भूभुजाम॥
तस्याम्बुधित्रयनिवारितशासनस्य सत्याश्रयस्य परमाप्तवता प्रसादम् शैलं जिनेन्द्र भवनं।
भवनम्महिम्नां निर्मापितं मतिमता रविकीर्त्तिनेदम्॥
भारतीय युद्धाच्या ३७३५ वर्षांनंतर, कलियुगातील शकांच्या ५५६ वर्षांच्या कालखंडानंतर तीन समुद्रापर्यंत ज्याचे शासन होते त्या सत्याश्रयाच्या कृपेने ह्या जैन शैलमंदिराचे निर्माण रविकिर्तीने स्वतःच्या गौरवासाठी केले.
ह्यांनतर रविकिर्तीने स्वतःस कालिदास आणि भारवीसम मानलेले दिसते.
येनायोजि नवेश्मस्थिरमर्त्थविधौ विवेकिना जिनवेश्म।
स विजयतां रविकीर्तिः कविताश्रित कालीदासभारविकीर्तिः॥
विवेकी रविकिर्तीने आपले अर्थविधान स्थिर करण्यासाठी ह्या जिनालयाची निर्मिती केली आणि कालिदास आणि भारवीसारखे यश आपल्या काव्याद्वारे अर्जित केले.
ऐहोळेत कधी आलात तर मेगुती टेकडीवर जाणे विसरु नये, आणि वर आल्यावर मंदिरावरील हा लेख पाहणे चुकवू नये.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे ऐहोळेची टेकडी पसरट आहे हे लिहिलेच आहे, पण येथे केवळ मंदिरेच नसून त्यापेक्षाही अधिक प्राचीन काही आहे ते ही न चुकता बघावे. ती स्थळे आहेत अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे
अश्मयुगीन मानवाची दफनस्थळे
बदामीच्या सिदलाफडी गुहेची सफर करताना आपण मागे अश्मयुगीन मानवांनी काढलेली चित्रे पाहिलीत, येथे मात्र आहेत ती त्यांची दफनस्थळे. बदामी, ऐहोळे परिसरातील दगडांच्या विशिष्ट रचनांमुळे आणि त्यातील गुहांमुळे अश्मयुगीन मानवांना सुरक्षित आश्रय उपलब्ध होत असे त्यामुळे येथे जागोजागी त्यांच्या वास्तव्याच्या खुणा आढळतात. ऐहोळेत आहेत ती त्यांची दफनस्थळे. ही स्थळे मात्र तटबंदीच्या बाहेरच्या भागातल्या पठारावर असल्याने तेथे उतरुन जाणे सहज शक्य नाही, आम्हालाही पुढे पट्टदकलला जायचे असल्याने येथे उतरणे वेळेअभावी रहित केले, मात्र तटबंदीवरुन ही स्थळे सहजी दृष्टीस पडतात. दोन तीन उभे केलेले सपाट दगड आणि त्यावर ठेवलेला सपाट दगड अशी ह्यांची साधीसुधी रचना.
अश्मयुगीन दफनस्थळे
अश्मयुगीन दफनस्थळे
अश्मयुगीन दफनस्थळे
ही स्थळे पाहूनच आम्ही मेगुती टेकडी उतरायला लागलो. टेकडीवरुन ऐहोळे गावाचे विहंगम दर्शन होते.
ऐहोळे गाव
ऐहोळे गाव व मलप्रभा नदी
टेकडी उतरुन येईस्तोवर जवळपास दीड वाजत आला होता व आता आमचा प्रवास सुरु झाला तो पट्टदकलकडे, त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः





































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.