https://www.misalpav.com/node/15090
मला खूप काहि माहिती नाही पण हे ठीकाण सुंदरच आहे. बदामी -ऐहोळे च्या मार्गावर आहे. बदामी -ऐहोळे पेक्षा जास्त सुस्थितीत आहे. क्षेत्रफळ जरी कमी असले तरी जास्त रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे.
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
प्रास्ताविक
कित्येक वर्षांपासून बदामीला जायचं होतं पण योग काही येत नव्हता, तो ह्याच महिन्याच्या सुरुवातीस आला. झालं असं की ऑफिसमधल्या कामांमुळे सुट्ट्यांचं जुगाड काही जमवता येत नव्हतं, नोव्हेंबर महिन्यातले तर सर्व शनिवार, रविवार ऑफिसातच गेले होते, मित्रांनाही वेळेअभावी ठोस काही जमवता येत नव्हतं. तो योग अचानक जुळून आला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांनाही शनिवार रविवार जोडून एकूण ५ दिवस सुट्टी काढता येत होती मग ठिकाणे शॉर्टलिस्ट करायला लागलो. एकंदरीत ४ ठिकाणे निवडली आणि त्यातून एक ठिकाण निवडण्याचं पक्कं केलं. ऑल टाइम फेव्हरेट गोवा, कर्नाटकातले भद्रा व्याघ्र अभयारण्य, यवतमाळनजीकचे टिपेश्वर आणि बदामी. गोवा खूपदा झाल्याने साहजिकच मागे पडलं, भद्रा आणि टिपेश्वर तुलनेने लांबचे आणि शक्यतो डिसेंबरमध्ये वातावरण कितीही आल्हाददायक असलं तरी ह्या काळात शक्यतो वाघ दिसण्याचे प्रमाण कमी असते म्हणून ही दोन्ही ठिकाणे उन्हाळ्यासाठी ठरवली आणि शेवटी उरलं ते बदामीच. एकतर बदामी उन्हाळ्यात खूप तापतं, शिवाय पायपीटही बदामीला बर्यापैकी आहे, शिवाय तिघांपैकी कुणीही बदामीला अजून गेलं नव्हतं त्यामुळे बदामी एकमताने फायनल झालं. मग आता त्यादृष्टीने राहाण्याच्या ठिकाणाचं बुकिंग करायचं ठरवलं. कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचा हंपी येथील अनुभव उत्तम असल्याने फारसा विचार न करताच मेकमायट्रिपवरुन मयुरा चालुक्य बदामी येथे ३ रात्रींसाठी बुकिंग केलं. सेमी डिलक्स नॉन एसी तिघांसाठी मिळून ३ रात्रींसाठी ७००० रु. पडले. वास्तविक बदामीस क्लार्क्स इन, बदामी हेरीटेज, बदामी कोर्ट अशी उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत मात्र ती तुलनेने महाग, तर बसस्टॅण्डच्या आसपास भरपूर लॉजेस आहेत ती तुलनेने खूपच स्वस्त, मात्र पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मयुरा चालुक्य तसं गर्दीपासून दूर, शांत, पार्किंग प्रशस्त आहे, मात्र चांगले असूनही मेन्टेनन्स आणि सर्व्हिसची तुलनेने बोंबच आहे ते एक असो. काय काय बघायचे, कसे कसे बघायचे ह्याबाबत कंजूसकाकांशी फोनवर सतत चर्चा चालू होत्याच. त्यांच्या मार्गदर्शनाबद्द्ल त्यांचे आभार न मानणे हे कृतघ्नपणाचेच ठरेल.
नियोजन केले ते असे.
२ डिसेंबर - कोल्हापूर मुक्काम
३ डिसेंबर- बदामी चेक आणि बदामी लेणी दर्शन
४ डिसेंबर - ऐहोळे, पट्टदकल
५ डिसेंबर - बदामी किल्ला, भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, महाकूट समूह आणि बनशंकरी.
ह्या पाच डिसेंबरच्याच दिवशी सिडीलापडीच्या रूपाने एक अनपेक्षित लाभ झाला. वेळेअभावी हे ठिकाण खरं तर टाळणार होतो पण ते वेळेत बसवलेच, त्याबद्द्ल नंतर लिहिनच.
६ डिसेंबर - परतीचा प्रवास
तर २ तारखेला ऑफिसमधून लवकरच बाहेर पडलो आणि साधारण दुपारी पावणेचारच्या आसपास पुणे सोडले. बदामीला जाण्यासाठी पुण्यातून दोन प्रमुख मार्ग आहेत. एक जातो तो सोलापूर, विजयपूर-बदामी आणि दुसरा आहे तो कोल्हापूर - निपाणी - संकेश्वर - गोकाक - रामदुर्ग - बदामी. आम्ही कोल्हापूरवरुन जाण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने हॉटेल ओपलला अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते. साडेसात/आठच्या आसपास ओपलला पोहोचलो, रूमवर बॅगा टाकून लगेचच रिक्षाने महालक्ष्मी मंदिरात गेलो, दर शुक्रवारी देवीच्या पालखीचा सोहळा मंदिरात असतो तो यावेळी प्रथमच बघायला मिळाला. मग रात्री निवांत ओपललाच जेवण केले आणि राऊंड ऑफ १६ मधील एक फूटबॉल वर्ल्ड कप मॅच पाहता पाहता झोपी गेलो. सकाळी ओपलचा नाष्टा ८ वाजताच सुरु होतो, कोल्हापूरपासून बदामी साधारण २२० किमी आहे आणि आमचे बदामीचे चेक इन देखील दुपारी एक वाजता असल्याने पुरेसा वेळ हाती होताच. नाष्टा करुन साधारण ९ च्या आसपास कोल्हापूर सोडले ते निपाणी, संकेश्वर, गोकाक (अर्थात हे सर्वच रस्ते गावात न जाता बाहेरुन जातात) करुन साधारण दीडच्या आसपास मयुरा चालुक्य येथे चेक इन केले. रूम अगदी प्रशस्त असून ३ सिंगल बेड आहेत, शिवाय सोलर सिस्टम असल्याने गरम पाणी २४ तास उपलब्ध असते. थोडं फ्रेश होऊन तिथेच जेवण केले. चालुक्य रेस्टोरंटची सर्व्हिस मात्र खूप स्लो आहे. पावणेतीन्/तीन पर्यंत जेवण उरकले. आता आजचा प्लान होता बदामीच्या गुहा पाहणे. संपूर्ण बदामी गावाच्या पाठीमागेच बदामीचा बदामी रंगाचा डोंगर एखाद्या खडा पहारा देत उभा आहे. डोंगरावरील शिवालये, बुरुज कोठूनही स्पष्ट दिसतात. गुहांच्या इथेच गाड्यांसाठी वाहनतळ आहे. हॉटेलपसून पाच सात मिनिटातच वाहनतळावर पोहोचून वाहन लावले आणि तिकिट काऊंटर तिकीट काढून (२५ रु. प्रत्येकी) बदामीच्या गुहा पाहण्यास निघालो. मात्र बदामीच्या गुहा पाहण्याआधी आपल्याला बदामीच्या चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास
इ.स.सहाव्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत एका शक्तिशाली राजघराण्याचा उदय झाला. ते घराणे म्हणजे बदामीचे चालुक्य. बदामीचे पूर्वीचे नाव वातापी. इल्वल आणि वातापि हे दोघे राक्षसबंधु. इल्वल आलेल्या अतिथींना आग्रहाने भोजनास बोलवत असे आणि वातापि हा मेढ्यांचे रूप घेऊन अतिथींच्या पानात मांसाच्या रूपाने जात असे आणि अतिथींचे जेवण झाल्यावर त्यांचे पोट फाडून परत जीवंत बाहेर येत असे. एकदा अगत्स्य ऋषी तेथून जात असता इल्वल मानभावीपणाने त्यांना जेवायला घेऊन गेला, ऋषींनी वातापिरुपी मांसान्न खाल्यावर इल्वलाने वातापि, बाहेर ये अशी हाक मारली असता तो बाहेर आलाच नाही, अगत्स्याने वातापिला पचवून टाकले आहे हे ओळखून इल्वल त्यांना शरण गेला आणि त्याने ते ठिकाण कायमचे सोडले. हे जे ठिकाण आहे तीच बदामी, अर्थात चालुक्यांची राजधानी वातापी. उत्तर चालुक्यांच्या लेखात चालुक्य ह्या संज्ञेविषयी काही आख्यायिका आहेत. हे चलिक्य किंवा चलुक्य नावाच्या प्रदेशातले होते किंवा साळी हे त्यांचे कुल होते. ह्यावरुन त्यांचे चालुक्य हे कुलनाम आले असावे असा एक तर्क आहे.
चालुक्य हे सुरुवातीला बनवासीच्या कदंबाचे सरदार होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्या घराण्याचा पहिला पुरुष जयसिंह हा होता. जयसिंहाचा पुत्र रणराग आणि त्याचा पुत्र पुलकेशी (पहिला). पुलकेशीने बनवासीच्या कदंबांना हरवून वातापी नामक राजधानीची निर्मिती केली. पुलकेशीने अश्वमेध व इतर अनेक यज्ञ केले व हिरण्यगर्भ नामक दान दिले असा ऐहोळे प्रशस्तीत उल्लेख आहे.
तस्याभवत्तनूजः पोलेकेशी यः श्रीतेन्दुकान्तिरिप।
श्रीवल्लभोप्ययासीद्वातापिपुरीवधूवरताम्॥
यस्त्रिवर्ग्गपदवीमलं क्षितौ नानुगन्तुमधुनापि राजकम्।
भूश्व येन हयमेधयाजिना प्रापितावभृथमज्जना बभौ॥
चंद्राच्या कांतीसमान असलेला श्रीवल्लभ पुलकेशी हा (रणरागाचा) पुत्र असून वातापिरुपी वधू त्याने वरली होती. त्याने राजांना अप्राप्य असलेली त्रिवर्ग हे बिरुद धारण केले होते आणि अश्वमेध यज्ञ करुन अवभृत स्नान करुन सर्व लोकांना आश्चर्यचकित करुन सोडले होते.
पहिल्या पुलकेशीने आपल्या सार्वभौमत्वाचे द्योतक म्हणून त्याच्या पूर्वीच्या राजांच्या "राजन्" आणि "नृप" अशा साध्या विरुदाऐवजी "महाराज" हे बिरुद धारण केले. तसेच त्याने सत्याश्रय, रणविक्रम आणि श्रीपृथ्वीवल्लभ अशी विरुदेही धारण केली. त्याने इ.स. ५३५ ते ५६६ पर्यंत राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर कीर्तिवर्मन(पहिला) हा राज्यावर आला. पुलकेशीचा दुसरा पुत्र मंगलेश, हादेखील महापराक्रमी होता. मंगलेशाच्या महाकूट येथील स्तंभलेखात किर्तीवर्मनाने अंग, वंग, कलिंग इत्यादी जिंकलेल्या प्रदेशांची नावे दिली आहेत. त्याने आपल्या राज्याचा पुष्कळ विस्तार केला. ह्या किर्तीवर्मनचा पुत्र पुलकेशी (दुसरा). हा पुलकेशी चालुक्य वंशातील सर्वात महापराक्रमी राजा. मात्र किर्तीवर्मनच्या मृत्युप्रसंगी पुलकेशी अल्पवयीन असल्याने मंगलेश हा राजा झाला. ह्या मंगलेशाने कलचुरींवर आक्रमण करुन त्यांना जिंकले आणि नंतर पश्चिम किनार्यावरील रेवतीद्विपावर स्वारी करुन ते द्विप जिंकले. ह्या रेवतीद्विपाबद्द्ल काही मतभेद आहे. कुणी म्हणतात ते कोकणातले रेडी असावे किंवा रेवदंडा असावे तर कोणी हे गोवे असावे असे म्हणतात कारण कदंब त्याकाळी क्षीण झाले होते. मात्र हे रेवतीद्विप कोकणच्या मौर्यांकडून त्याने जिंकून घेतले असे शिलालेखात स्पष्ट उल्लेख असल्याने हे कोकणातलेच कुठलेतरी ठिकाण असावे असे मानता यावे. ह्या मंगलेशाला मात्र आपल्या मुलांसाठी सत्तेचा मोह सोडवेना झाला आणि त्याने पुलकेशी (द्वितीय) ह्याचा वारसा हक्क नाकारला आणि यातूनच पुलकेशी आणि मंगलेश यामध्ये ठिणगी पडली ज्याचे पुढे अग्नीत रुपांतर होऊन मंगलेशाला सत्ता आणि आपले प्राणही गमवावे लागले.
ऐहोळे प्रशस्ती म्हणते
तस्याग्रजस्य तनया नहुषानुभावे लक्ष्म्या किलभिलषिते पोलकेशिनामम्नि।
सासूयमात्मानि भवन्तमतः पितृव्यम् ज्ञात्त्वापरुद्धचरितव्यवसायबुद्धौ॥
स यदुपचित मन्त्रोत्साहशक्तिप्रयोग क्षपितवलविशेषो मङ्गलेशः समन्तात्।
स्वतनयगताराज्यारम्भयत्नेन साद्धं निजमतनु च राज्यंञ्जीवितंञ्चोज्झति स्म॥
त्याच्या (मंगलेशाच्या) भावाचा (किर्तीवर्मन) पुत्र पुलकेशी होता जो नहुषासमान असून लक्ष्मीला प्रिय होता. पित्यासमान असलेल्या मंगलेशाने आपली सारासारविवेकबुद्धी सोडून पुलकेशीविरुद्ध विपरीत आचरण केले त्यामुळे त्याने (पुलकेशीने) आपल्या मंत्र, उत्साह आणि बलप्रयोगाने मंगलेशाचे बळ नष्ट करुन टाकले. आपल्या पुत्रासाठी झालेल्या सत्तामोहामुळे मंगलेशाला राज्यासकट जीवीतही गमवावे लागले.
पुलकेशी आणि मंगलेशातील या संघर्षामुळे अराजक माजले होते. त्यांचे शत्रू, सामंत, मांडलिक, इतर सरदार घराणी ह्या अराजकाचा फायदा न घेते तरच नवल.
तावत्तच्छत्रभङ्गो जगदखिलमरात्यन्धकोरापरुद्धं यस्यासह्यप्रद्युतिततिभिरिवाक्क्रान्तमासीत्प्रभातम्।
मंगलेशाच्या अंतानंतर संपूर्ण जग शत्रूरूपी अंधःकाराने व्याप्त झाले होते मात्र पुलकेशीच्या प्रचंड प्रभावाने पुन्हा पहाटेचे आगमन झाले.
या सर्व शत्रूंचा पराभव करुन पुलकेशीने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्याने वनवासीवर स्वारी करुन कदंबांना पुन्हा जिंकले आणि गंग आणि अलूपवंशीयांना धडा शिकवला. नंतर कोंकण मौर्यांना हरवून त्यांची राजधानी पुरी (घारापुरी) जिंकली. त्यानंतर पुलकेशी लाट, सौराष्ट्र आणि माळवा आपल्या अधिपत्याखाली घेतले आणि त्यानंतर सम्राट हर्षवर्धनावर विजय मिळवला व त्याला नर्मदेपलीकडे माघार घ्यावयास भाग पाडले.
अपरिमितविभूतिस्फीतसामन्तसेना मुकुटमणिमयूखाक्क्रान्तपादारविन्दः।
युधि पतितगजेंद्रानीकबीभत्सभूतो भयविलगित हर्षों येन चाकारि हर्षः॥
अपरिमित ऐश्वर्याने युक्त असलेल्या विभूतीसमान सामंतांच्या मुकुटमण्यांनी युक्त असलेला हर्ष सुद्धा त्याचे प्रचंड गजसैन्य नष्ट झाल्यामुळे अहर्ष (दु:खी) होऊन गेला.
यानंतर पुलकेशीने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला. ऐहोळे प्रशस्तीत महाराष्ट्र या नामाचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो असा.
विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पस्तिसृभिरपि गुणौधैस्वैश्च माहाकुलाद्यैः।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्टकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणाम्॥
आपल्या विविध गुणांनी आणि कुलिनतेने इंद्रासमान असलेल्या पुलकेशीने तिन्ही महाराष्ट्र प्रदेशांवर त्यातील ९९००० गावांसह स्वामित्व प्राप्त केले.
त्यापाठोपाठ पुलकेशीने कोसल आणि गंगांचा पराभव केला, आणि आंध्र जिंकले, लगोलग त्याने चोल आणि पांड्यांशी मैत्री संपादन करुन पल्लवांवर स्वारी केली. त्याला कांची जिंकता आली नाही मात्र पल्लवांचे साम्राज्य बरेच खिळखिळे झाले. इ. स. ६४२ मध्ये आपल्या पित्याच्या पराभवाचा सूड घेण्याच्या दृष्टीने महेंद्रवर्मन याचा उत्तराधिकारी पहिला नरसिंहवर्मन याने अचानकपणे चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. हा हल्ला एवढ्या तडकाफडकी करण्यात आला की, त्यात पुलकेशी देखील बेसावध अवस्थेत पकडला गेला. पल्लव सैन्याने चालुक्यांचा प्रदेश पादाक्रांत करून वातापीस वेढा टाकला. पुलकेशीने सैन्याची जमवाजमव करून राजधानी वाचविण्यासाठी प्रखर प्रतिकार केला. परंतु या लढाईत स्वतः पुलकेशी मारला गेल्यामुळे युद्धाचे पारडे पल्लवांच्या बाजूने झुकले. नरसिंहवर्मनने वातापीचा जिंकली आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने "वातापीकोंडा" हे विरुद धारण केले व या पराक्रमाचे स्मारक म्हणून वातापी येथील प्रस्तरावर आपल्या राजाज्ञेचा शिलालेख कोरविला. चालुक्य वंशातील सर्वश्रेष्ठ आणि प्राचीन भारतातील श्रेष्ठ असलेल्या पुलकेशीचा असा दुर्दैवी अंत झाला.
त्यानंतर १२/१३ वर्षे चालुक्यांसाठी कसोटीची ठरली, त्याच्या पुत्रांमध्येही बेदिली माजली, त्यानंतर त्याचा पुत्र विक्रमादित्य हा सत्तेवर आला. आपला भाऊ आदित्यवर्मन आणि त्याचा पुत्र अभिनवादित्य ह्यांचा पराभव करुन वातापीवर आपला ताबा पुनःस्थापित केला आणि राज्य स्थिरस्थावर झाल्यावर आपले परंपरागत शत्रू असलेल्या पल्लवांवर मोर्चा वळवला. पल्लव प्रदेश व्यापून व कांची शहर जिंकून वातापीच्या पाडावाचा व पुलकेशीच्या मृत्यूचा पूर्ण बदला घेतला. विक्रमादित्याच्याच काळात चालुक्यांच्या प्रदेशात शांततेचे युग सुरु झाले आणि पट्टदकल येथील मंदिरांची उभारणी सुरु झाली. ६८१ मध्ये त्याच्या मृत्युनंतर युवराज विनयादित्य हा सत्तेवर आला. हाही पित्यासमान पराक्रमी होता. पल्लव पाण्ड्य, चोल, केरळ, कलभ्र, हैहेय, विल, मालव, अलूप व गंग इत्यादी अनेकांचा याने पराभव केला. कनोजच्या यशोवर्मनशी चालुक्यांचा संघर्ष होऊन त्यात विनयादित्याची अखेर झाली व विजयादित्य सत्तेवर आला. ह्याची कारकिर्द प्रदीर्घ आणि शांततेची ठरली.
विजयादित्यानंतर इस ७३३ साली विक्रमादित्य (द्वितीय) हा सत्तेवर आला. ह्याच्या कारकिर्दित पुन्हा पल्लवांविरुद्धच्या लढाईला तोंड फुटले. पल्लवांचा पराभव करुन याने पांड्य, चोल, केरळ आणि कलचुरींचा पराभव केला आणि हिंदी महासागराच्या तीरावर विजयस्तंभ उभारला. याच्यानंतर इसवी ७४५ मध्ये त्याचा पुत्र किर्तीवर्मन (द्वितीय) सत्तेवर आला. मात्र आता मांडलिक सत्ता प्रबळ होऊ लागल्या होत्या, मान्यखेतच्या राष्ट्रकूटांनी त्यांना आव्हान दिले. कर्क राष्ट्रकूटाने चालुक्यांचे राज्यादेश झुगारुन स्वतंत्र शासन जारी केले. वेरुळ लेण्यात शिलालेख असणार्या दंतिदुर्गाने किर्तीवर्मनचा पराभव करुन महाराष्ट्र आणि कोंकण जिंकले आणि राष्ट्रकूटांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली आणि इसवी सन ७५० साली वातापीचे राज्य खालसा झाले.
अर्थात राष्ट्रकूटानंतर परत बदामीच्या चालुक्यांच्या दोन शाखा पुन्हा उदयाला आल्या. ते स्वतःस बदामीच्या चालुक्यांचे वंशज म्हणवून घेत. एक शाखा आंध्रप्रदेशाच्या समुद्रकिनार्यानजीक असलेल्या वेंगी येथे राज्य करु लागली ते म्हणजे वेंगीचे अथवा पूर्वेचे चालुक्य आणि दुसरी शाखा दक्षिण कर्नाटकातील बसवकल्याण येथून राज्य करु लागली ते म्हणजे कल्याणीचे चालुक्य. हे कल्याणीचे चालुक्यही महापराक्रमी होते. अर्थात विस्तारभयास्तव त्यांच्याबद्द्ल येथे अधिक लिहिणे शक्य नाही.
येथे आपण चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास जाणून घेतला आहे. चालुक्यांनी कित्येक शिलालेख, प्रशस्ती कोरवल्यामुळे त्यांच्याबद्द्ल इतिहासात विपुल माहिती उपलब्ध आहे. ह्याच बदामीच्या चालुक्यांच्या कालखंडात बदामीच्या लेण्यांची निर्मिती झाली, बदामीची मंदिरे, ऐहोळे, पट्टदकल, महाकूट यांसारख्या असंख्य मंदिर समूहांची निर्मिती झाली आता त्यांच्याबद्दलच आपण एकेक करुन जाणून घेऊयात. सर्वप्रथम जाऊ बदामीची लेणी पाहायला.
बदामीची लेणी
बदामीच्या लेण्यांकडे जाताच आपली नजर फिरते ती तिथल्या भव्य कड्यांभोवती. निव्वळ अद्भूत आहे हे सर्व. एखाद्याला मानवनिर्मित कलेची आवड नसेल तरीही तो निसर्गाच्या निर्माण केलेल्या कलेत ह्या कलेत रममाण होणार यात यत्किंचितही शंका नाही. वाहनतळातूनच आपल्या पहिल्या लेणीचे दर्शन होते. बाजूच्याच अंगावर येणार्या प्रचंड कड्यातूनच पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण केला आहे.
लेणी क्र. १
हे लेणे शैव आहे. साधारण सहाव्या शतकाच्या सुरुवातीचे हे लेणे असावे. उभ्या कड्यात आयताकृती आकारात खोदून हे लेणे तयार केले असून चार स्तंभांवर तोललेले आहे. मुखमंडप (व्हरांडा) त्याच्या बाजूला एक अर्धमंडप, पुढे सभामंडप व त्यापुढे गुहेच्या सर्वात शेवटी गर्भगृह अशी याची रचना.
लेणी क्र. १ चे मुखदर्शन
ह्या लेणीच्या व्हरांड्यात नटराजाची अप्रतिम मूर्ती असून बाजूच्या त्यावर असलेल्या कोनाड्यात महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेयाची मूर्ती आहे.
नटराज
१८ हातांचा हा नटराज अतिशय सुंदर असून ह्याच्य नृत्यमुद्रा सुमारे ८१ होतात. डाव्या बाजूस नंदी व बाजूस नृत्यगणेश असून एक सेवक तालवाद्य वाजवत आहे.
व्हरांड्याची आतील बाजूस महिषासुरमर्दिनी आणि कार्तिकेय आहेत.
महिषासुरमर्दिनी
मोरावर आरुढ कार्तिकेय
व्हरांड्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूस आहे हरिहर तर उजव्या बाजूस आहे अर्धनारीश्वर
हरिहर
हे एक जबरदस्त सुंदर शिल्प आहे. शैव आणि वैष्णवांमधला संघर्ष मिटवण्याच्या दृष्टीने या दोन देवतांना एकत्र आणून हरिहराच्या रूपाने ह्यांचे संयोजन करण्यात आली. ह्या शिल्पात असंख्य बारकावे आहेत. अर्धी बाजू शैव तर अर्धी वैष्णव असल्याने दोन्ही देवतांच्या विविध लक्षणांचे येथे सुंदर दर्शन होते. विष्णूचा मुकुट हा भरजरी आहे तर शिवाच्या जटायुक्त असून त्यात अर्धचंद्र आहे. विष्णूचा बाहू दागिन्यांनी युक्त असून शिवाने आपल्या बाहूत नाग धारण केला आहे. विष्णूचे कटिवस्त्र भरजरी असून शिवाने गजचर्म परिधान केले आहे. विष्णूने आपल्या हातात शंख आणि पद्म धारण केले असून शिवाच्या हाती नाग आणि त्रिशूळ आहे. विष्णूच्या बाजूस त्याचे वाहन गरुड असून शिवाकडे त्याचे वाहन नंदी आहे. विष्णूच्या बाजूस लक्ष्मी असून शिवाच्या बाजूस पार्वती आहे.
ह्याच्या समोरील बाजूस आहे अर्धनारीश्वर
अर्धनारीश्वर
हेही येथील एक अत्यंत देखणे शिल्प. पुरुष आणि प्रकृतीचे मिलन या शिल्पाद्वारे दाखवले जाते. अर्धी बाजू शिवाची तर अर्धी पार्वतीची.
पार्वतीने केस शृंगारले असून शिवाचे जटायुक्त आहेत व त्यात अर्धचंद्र आहे. पार्वतीने हातात कमळ तर शिवाने हातात त्रिशूळ धारण केला आहे. पार्वतीने साधेच पण नक्षीदार कटीवस्त्र परिधान केले आहे तर शिवाच्या कमरेला नागबंधन आहे. पार्वतीच्या हातात बांगड्या तर शिवाच्या हातात रूद्राक्षाची माळ आहे. पार्वतीने पायात पैंजण घातले असून शिवाचे पाय मोकळेच आहेत. पार्वतीच्या बाजूला करंडा घेतलेली सखीपार्वती असून शिवाच्या बाजूला परमभक्त भृंगी आहे व बाजूस नंदी हे वाहन उभे आहे.
हरीहर आणि अर्धनारीश्वर या दोन मूर्तीच्या मध्ये असलेल्या छतावर वेटोळ्यावर आरुढ झालेल्या नागराजाचे अप्रतिम शिल्प आहे जे चुकवू नये असेच. बदामी, ऐहोळे, पट्ट्दकल या भागातील लेणी, मंदिरे पाहताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे छताची आतील बाजू पाहाणे. येथील परिसरातील छतांवर देखण्या मूर्ती आहेत, नक्षीदार कलाकुसरी आहेत.
छतावरील भारवाहक यक्षही बघण्यासारखे आहेत.
आतमध्ये गाभार्यात शिवलिंग आहे, येथे आत वटवाघुळे मोठ्या संख्येने आहेत. नटराजाच्या समोरील बाजूस एका शैव द्वारपालाचे सुरेख शिल्प कोरलेले आहे. त्याच्या वरील बाजूस शिवपार्वती नंदीवर आरुढ झालेले आहेत तर खालील बाजूस बैल आणि हत्ती यांचे एकत्रित असे शिल्प आहे.
चला तर आता लेणी क्र. २ ला जाऊयात.
लेणी क्र. २
ह्या लेणीत जाताना बदामीच्या कड्यांचे सुंदर दर्शन होत राहते.
बदामीचे कडे
समोर दिसणारे वरचे शिवालय
हे लेणे वैष्णव असून याची रचनाही लेणी क्र. १ सारखीच आहे.
व्हरांड्यातील एका बाजूस विष्णूचा त्रिविक्रम अवतार तर आहे दुसर्या बाजूस विष्णूचा वराह अवतार आहे.
त्रिविक्रम अवतार
खालच्या बाजूला बटूरूपातील छत्रीधारी वामन उभा असून त्याच्या हातावर उदक सोडून तीन पावले मावतील इतकी भूमी देणार्या बळीराजाची मूर्ती कोरलेली आहे तर त्याच्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य उभा असून तो बळीला त्यापासून परावृत्त करतो आहे. पण बळीने अखेर दानाचे उदक सोडल्यावर विष्णूने आपले त्रिविक्रमाचे मूळ रूप प्रकट केले. एक पाय अतिशय उंच करून त्याने जणू स्वर्गच पादाक्रांत केला आहे तर दुसर्या पायाने त्याने सर्व पृथ्वी व्यापून टाकिली आहे आता जणू तो बळीला तिसरा पाय कुठे ठेऊ असे विचारत आहे. बळीचे सेवक त्रिविक्रमावर धावून जात आहेत तर गरुड एका पायाला धरुन बसला आहे.
त्रिविक्रम संपूर्ण पट
वामन, मध्ये शुक्राचार्य आणि वामनाला अर्ध्य देतांना बळीराजा
ह्याच्याच समोरील बाजूस वराह अवतार आहे. वराहाने आपल्या सुळ्यावर पृथ्वी तोललेली असून तो शेषनागावर आरुढ आहे तर बाजूलाच पृथ्वीचे हरण करणारा हिरणाक्ष्य राक्षस विष्णूस शरण जात आहे.
व्हरांड्यातील छतावर अप्रतिम कोरीवकाम असून चक्र, स्वस्तिकचिन्हरुपी भुलभुलय्यासारखी कमालीची मोहक नक्षी कोरलेली आहे. त्याच्या आजूबाजूस समुद्रमंथनासारखे देखावे आहेत.
छतावरील कोरीवकाम
छतावरच एका बाजूला गरुडारूढ विष्णूची मूर्ती कोरलेली आहे.
गर्भगृहात विष्णूपीठ असून त्यावरची मूर्ती मात्र आज नष्ट झालेली आहे.
लेणी क्र. २ आणि तीनच्या मध्ये वरच्या किल्ल्यावर जाणारा खोदीव प्रवेशमार्ग आहे तो मात्र आज पुरातत्व खात्याने बंद ठेवला आहे. येथे किल्ल्यावर जायचे असल्यास बनशंकरी रस्त्यवरुन एका पायवाटेने जाता येते.
लेणी क्र. ३
हे येथले सर्वात प्रचंड आणि भव्य लेणे. वरच्या स्तरात असलेल्या ह्या लेणीत जायचा मार्ग कातळातून खोदून काढला आहे. हेही लेणे महाविष्णूला समर्पित आहे. समोर भव्य प्रांगण, व्हरांडा, त्यातील स्तंभांवर कोरलेल्या सुरसुंदरी, वादकांची शिल्पे, दोन्ही बाजूस असणारे विष्णूचे अवतार, छतांवरील दिक्पाल, विस्तीर्ण सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना. केवळ ह्याच लेण्यात लेणी कोरल्याचा शिलालेख आहे. हे लेणे मंगलेशाने शके ५०० (इसवीसन ५७८) मध्ये कोरवून विष्णूस समर्पित केले अस सर्वसाधारण आशय.
लेणीत जायचा कोरीव जीना
लेणी क्र. ३ चे मुखदर्शन
मुखमंडप हा ६ पूर्णस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांवर तोलला गेलेला असून सर्व बाजूस कमालीचे देखणे मूर्तीकाम आहे.
मुखमंडपातील उजव्या बाजूस त्रिविक्रमाची मूर्ती कोरलेली असून त्याची रचना लेणी क्र. २ मधील त्रिविक्रमासारखीच आहे, मात्र येथील मूर्ती अधिक देखणी आणि अधिक भव्य आहे.
त्रिविक्रम
ह्याच्याच आतील बाजूस नृसिंहावताराची उभी मूर्ती कोरलेली आहे.
तर नृसिंहाच्या शेजारी हरिहर आहे.
नृसिंहाच्या बरोबर समोर अष्टभुज विष्णू असून मुखमंडपाच्या आतील बाजूस शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेला महाविष्णूची अतीव देखणी मूर्ती आहे. तर त्याच्या बाजूस वराहावतार आहे.
शेषावर बसलेला महाविष्णू
महाविष्णू आणि वराहावतार
मुखमंडपातील प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस गरुडाची अतिशय भव्य मूर्ती आहे जी अगदी आवर्जून पहावी अशीच. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात, इथे मात्र प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षच उत्कट असे म्हणावेसे वाटते. ह्या मूर्तीची भव्यता छायाचित्रात कदापिही येणार नाही.
गरुड
येथील छतांवर रंगीत नक्षीकाम आहे तर स्तंभशिल्पे देखणी आहेत. यातील एक विशेष शिल्प म्हणजे मद्याच्या नशेत चूर झालेली तरुणी आणि तिला सावरणार्या तिच्या प्रियकराचे शिल्प.
रंगांचे नमुने
मुखमंडप आणि सभामंडपातील छतांवर अष्टदिक्पाल, कार्तिकेय, ब्रह्मादिक देवता कोरलेल्या आहेत.
इंद्र
ब्रह्मा
शिव आणि वरुण
--
येथेही गर्भगृहात मूर्ती नाही.
लेणी क्र. ४
ह्याच्याच वरील बाजूस ही लेणी आहेत. चालुक्यांचे काही महाल जैन होते, तसेच जैन धर्मालाही त्यांचा उदार आश्रय होता. हे लेणे म्हणजे एक जिनालय आहे. खुला मुखमंडप, आयताकार सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. सातव्या शतकात कोरले गेलेले हे लेणे येथील सर्वात लहान लेणे असून आत जैन तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मुखमंडपातील आतल्या उजव्या बाजूस महावीरांचे गुरु पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे.
तर त्याच्या समोरील बाजूस बाहुबलीची सुबक मूर्ती कोरलेली आहे.
समोरील देवकोष्ठात तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ
येथीलच एका बाजूस महावीरांच्या बाजूस बसून संलेखना करणारी जैन साध्वी जक्कावे हीचे शिल्प कोरलेले आहे.
तर गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती आहे.
येथे आपले लेणीदर्शन समाप्त होते. आधी म्हटल्याप्रमाणे केवळ लेणीदर्शन हा हेतू न ठेवताही येथे येणार्यांसाठी निसर्ग आपले अनेक विभ्रम दाखवत असतो. बदामीचे भव्य कडे, त्यातून समोरच्या किल्ल्याचे होणारे दर्शन, खालील बाजूस असणारा नयनरम्य अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे केवळ अद्भुतरम्य.
अगस्ती तलाव आणि समोरील बाजूचे वरचे शिवालय आणि बदामीचा किल्ला
भूतनाथ मंदिराचे होणारे मोहक दर्शन
अगस्ती तलाव, वरचे शिवालय
निसर्ग आपले विभ्रम दाखवताना
सूर्य मावळतीला लागला आणि त्याच सुमारास चंद्र उगवू लागला. आम्ही बदामीच्या गुहा उतरुन वाहनतळानजीक आलो.
तिथून लगेचच मशिदीच्या बाजूने अगस्ती तलावावर गेलो. काठावर एक अत्यंत सुंदर मंदिर आहे. वेस्सर (द्राविड आणि नागरी मिश्र शैली) शैलीतील हे मंदिर कमालीचे देखणे आहे. मूर्तीकाम नाही.
मंदिराच्या पुढ्यातील अगस्ती तलाव व समोरील बाजूस असणारे भूतनाथ मंदिर
आता अंधार वेगाने पडू लागला होता व आमचे उद्याचे लक्ष्य होते ते ऐहोळे आणि पट्टदकल येथील मंदिरसमूह. सकाळी लवकरच निघायचे असल्याने रूमवर जाऊन जेवण करुन थोड्याफार गप्पा मारुन लगेचच झोपी गेलो.
अर्थात दुसर्या दिवशी जरी आम्ही ऐहोळेला गेलो असलो तरी लेखमाला भौगोलिक दृष्ट्या संलग्न व्हावी म्हणून आम्ही तिसर्या दिवशी केलेल्या बदामी लेण्यांच्या समोरील बाजूस असलेल्या खालचे आणि वरचे शिवालय, बदामी किल्ला आणि भूतनाथ मंदिराची सफर आधी सांगेन अणि मगच ऐहोळे-पट्टदकलविषयी लिहायला घेईन.
क्रमशः
यानंतर पुलकेशीने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला. ऐहोळे प्रशस्तीत महाराष्ट्र या नामाचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो असा.
विधिवदुपचिताभिश्शक्तिभिश्शक्रकल्पस्तिसृभिरपि गुणौधैस्वैश्च माहाकुलाद्यैः।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्टकाणां नवनवतिसहस्रग्रामभाजां त्रयाणाम्॥आपल्या विविध गुणांनी आणि कुलिनतेने इंद्रासमान असलेल्या पुलकेशीने तिन्ही महाराष्ट्र प्रदेशांवर त्यातील ९९००० गावांसह स्वामित्व प्राप्त केले.
ये बात कुछ हजम नही हुई ...
त्याकाळी ९९००० हजार गावे महाराष्ट्रात असतील का ?
आज सुद्धा महाराष्ट्रात तेव्हडी गावे नाहीत ...
By: Express News Service
Mumbai | December 12, 2020 6:27:47 am
NewsguardThe State Election Commission on Friday announced elections for 14,234 gram panchayats across 34 of Maharashtra’s 36 districts on January 15, 2021.
While nominations can be filed from December 23 to December 30, results will be declared on January 18, 2021. The model election code of conduct came into force immediately after the announcement.
Elections for 1,566 gram panchayats were slated to be held on March 31 but had to be postponed due to the Covid-19 pandemic.
There are 27,920 gram panchayats in Maharashtra and elections to 14,234 of them means nearly 50 per cent of the village bodies would go to polls next month.
हा आकडा अतिशयोक्त आहेच ह्यात काहीच शंका नाही, प्रशस्ती म्हणजे थोडीफार अतिशयोक्ती आलीच. अर्थात प्रस्तुत लेखातील ३ महाराष्ट्र कोणते याचा उलगडा आजतागायत पूर्णपणे झाला नाहीये. उत्तर कर्नाटक, मध्य व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मध्यप्रदेशातील मिळून तो भाग असावा असे ढोबळमानाने म्हणता येईल, आजच्या महाराष्ट्रातील सीमांशी प्रस्तुत लेखातील महाराष्ट्राशी तुलना करणे अयोग्य होईल.
शिल्पे काळी पडली नसून बदामीचे खडकात लाल, गुलाबी, पांढरा, पिवळ्या, करड्या, काळ्या, राखाडी अशा असंख्य रंगांच्या विविध छटा आहेत. त्यानुसार येथील शिल्पांचा रंग देखील बदलत असतो, शिवाय येथील काही शिल्पे ही अंधारात असून छायाचित्रेही केवळ मोबाईलवरच काढलेली आहेत त्यामुळेही ती काहीशी काळी दिसतात.
चालुक्यांचे आजचे वंशज, हे आजचे साळुंखे / सोळंकी / चाळके आहेत असे म्हटले जाते ...
तसेच मौर्यांचे मोरे , वाकाटकांचे वाकटे कोकाटे, सातवाहनांचे सातकर्णीचे सातपुते, गुप्तांचे गुप्ते, होयसळांचे भोसले, यादवांचे यादव जाधव,
परमारांचे पवार, क्षहारातचे खरात, कदंबाचे कदम ... असे अनेक ... राठोड चव्हाण अशी अनेक आडनावे यांची नाळ इतिहासात जोडली जाते ... त्यात कितपत तथ्य आहे ?
खरं तर बदामी किल्ला, अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील मंदिरं ही तिसर्या दिवशीची सफर. बदामीस पोहोचल्यावर पहिल्या दिवशी बदामी लेणी पाहून दुसरे दिवशी ऐहोळे आणि पट्टदकलची मंदिरे पाहून तिसरा दिवस थोडा आरामाचा जावा म्हणून त्या दिवशी फक्त बदामी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर आणि महाकूट मंदिर संकुल बघायचे ठेवले होते, मात्र ह्याच दिवशी हे सर्व बघूनही सिडलाफडी अनपेक्षितरित्या झाल्याने एक दमदार वाटचाल झाली होती. भौगोलिक सलगतेमुळे शिवाय इतरांनाही बदामी झटपट करता यावे म्हणून तिसर्या दिवशीच्या ह्या सफरीविषयी आधीच लिहितो आहे, याच्या पुढील लेखात सिडला फडी बघून आपण ऐहोळेतील मंदिरे बघायला जाऊ.
बदामी किल्ला
खरं तर बदामी किल्ला दोन वेगवेगळ्या पहाडांवर असल्याने त्याचे तसे दोन भाग पडतात, बदामी लेण्यांच्या वर असलेल्या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पुरातत्त्व खात्याने बंद केला आहे मात्र त्याच्या समोरील असलेल्या किल्ल्यावर मात्र सहजी जाता येते आणि बदामीच्या सफरीस आलेल्या प्रत्येकानेच ह्या किल्ल्याची अद्भूतरम्य सफर अवश्य करावी. होतं काय बरेचसे लोक सकाळी बदामी लेणी करुन दुपारी ऐहोळे पट्ट्दकल करुन रात्री मुक्कामी हंपीस जातात त्यामुळे बदामीतील ही ठिकाणे बघण्याची राहून जातात. असा घाईगडबडीचा दौरा त्या ठिकाणांनाही पूर्ण न्याय देत नाही तेव्हा बदामीस यायचे नियोजन करताना आपल्या हाती किमान अडीच दिवस असतील असे पाहूनच यावे. बदामी लेणी पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव पर्यटक बदामीच्या किल्ल्याला भेटच देत नाहीत त्यामुळे समोरच गर्दीने ओसंडून वाहणार्या बदामी लेणीपेक्षा इथे निरव शांतता प्रकर्षाने जाणवते.
तर बदामी किल्ल्यावर जाणे तसे अत्यंत सोपे आहे. बदामीच्या मुख्य बाजारातून अगस्ती तलावाकडे जाणारे सर्वच रस्ते इथे येऊन मिळतात मात्र इथे स्वतःची गाडी घेऊन जाऊ नये. कारण येथील अरुंद आणि दाटीवाटीच्या रस्त्यावर गाडी नेणे अत्यंत कठीण. जे पर्यटक बदामीस सार्वजनिक वाहनांनी आले आहेत त्यांनी चालत किंवा रिक्षाने बदामी किल्ल्याच्या पायथ्याशी येणे श्रेयस्कर. जे लोक खाजगी वाहनांनी आलेले आहेत त्यांनी वाहन हॉटेलवरच ठेवून रिक्षाने यावे किंवा बदामी लेण्यांच्या पार्किंगला स्वतःचे वाहन लावून किल्ल्याच्या पायथ्याशी चालत सात ते आठ मिनिटात पोहोचता येते. आम्ही हाच मार्ग निवडला. अर्थात इकडे चालत यायचे म्हणजे नाक दाबूनच यावे लागते. बाजूची वस्ती बकाल आहे, सांडपाणी, डुकरे, दुर्गंधी यांच्याशी सामना करतच येथवर पोहोचावे लागते. बदामी किल्ल्यावर जाण्यासाठी लेण्यांच्या पार्किंगमधून येण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे येल्लम्मा मंदिरावरुन अगस्तीतलावाच्या पायर्यांवरुन चालत जाऊन येथे पोहोचता येते, हा सर्वात जवळचा मार्ग, मात्र काही काही ठिकाणी ह्या पायर्या ओलांडणे थोडे जिकिरीचे आहे. तर दुसरा मार्ग यल्लम्मा देवळाच्या इथे असलेल्या वस्तीतून चालत जाऊन येथे पोहोचता येते. वाटेत ठिकठिकाणी वस्तीतील अरुंद वळणांवर 'बदामी संग्रहालय' असे फलक आहेत.
खालील छायाचित्रात दोन्ही मार्ग दिसतील. उजवीकडचा मार्ग तलावातील पायर्यांचा आहे तर मशिदीच्या बाजूस डावीकडील मार्ग हा वस्तीतून जाणारा आहे.
अगदी पाच सात मिनिटातच आपण वस्तीतून बाहेर येतो आणि एका प्रवेशद्वारातून आत जाताच बदामी किल्ल्याच्या शांत, सुंदर वातावरणात प्रवेश करतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग जरी लहान दिसत असला तरी येथून कारसारखी वाहने सहज प्रवेश करु शकतात मात्र कारने येथवर येणेच जिकिरीचे असल्याने ते टाळावेच.
प्रवेशद्वार
येथून पुढे आल्यावर दिसते ती बदामी पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयाची इमारत, त्याबद्द्ल आपण पुढे वाचूच. सकाळची वेळ असल्याने आम्ही आधी बदामी किल्ला पाहून मगच वस्तुसंग्रहालय पाहायचे ठरवले. बदामी किल्ल्यावर जाण्यास प्रवेश फी नाही.
बदामी पुराणवस्तु संग्रहालय
ह्याच्याच डाव्या बाजूस आहे ते किल्ल्यावर जाणारे पहिले प्रवेशद्वार. दोन भव्य प्रस्तरखंडांच्या बेचक्यात हे प्रवेशद्वार आहे.
मंडप
ह्या प्रवेशद्वारातून आत जाताच आपला इथल्या अद्भूत जगात प्रवेश होऊन आपण त्यात जणू हरवूनच जातो. चालुक्यांचा राजा पुलकेशी(पहिला) याने इसवी ५४३ मध्ये हा बळकट किल्ला बांधला. ह्याची तटबंदी पार अगस्ती तलावाला भिडली आहे. पर पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे जाताच प्रचंड मोठ्या प्रस्तरखंडांमधून एक प्रशस्त रस्ता पुढे जाताना दिसतो. हाच ह्या किल्ल्याचा राजमार्ग मात्र येथे डावीकडे एक लहानशी वाट एका बेचक्यात जाताना दिसते ही वाट न चुकवण्याजोगीच. ह्या वाटेतच लपला आहे किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाण्याचा मार्ग. एकमेकांना अगदी चिकटलेल्या दोन प्रचंड खडकांच्या बेचक्यातून जेमतेम एक माणूस घसटत घसटतच कसाबसा जाऊ शकेल इतकीच अरुंद असणारी पायर्यांची वाट आपल्याला किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे घेऊन जाते.
किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाणारी वाट
त्या वाटेवरुन वर आल्यावर एकदम प्रशस्त असे दोन टेहळणी मंडप दृष्टीस पडतात. येथून बदामीच्या कड्याचे, बदामी गावाचे, वरचे आणि खालच्या दोन्ही शिवालयांचे सुंदर दर्शन होते.
बेचक्यातून वर आल्यावर दिसणारे टेहळणी मंडप, उजवीकडे खालच्या बाजूस किल्ल्यावर जाणारा राजमार्ग
अगदी समोरच दिसणारे खालचे शिवालय
कड्याच्या वर असणारे वरचे शिवालय
हे सगळे निवांत पाहून बेचक्यातून खाली येऊन परत राजमार्गाला लागलो. अतिशय भव्य कड्यांच्यामधून जाणारी वाट काही पायर्या चढून डावीकडे वळते. लाल, गुलाबी, काळ्या, करड्या, निळसर इत्यादी रंगांच्या विविध छटा सकाळच्या कोवळ्या उन्हात निसर्गाचे अनोखे विभ्रम दाखवत असतात.
डावीकडे वळताच कड्याच्या दोन भागांमध्ये खुबीने बनवलेले एक अत्यंत देखणे प्रवेशद्वार नजरेस पडते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देखणे द्वारपाल कोरलेले आहेत.
प्रवेशद्वार
द्वारातून पुढे येताच दोन रस्ते फुटलेले दिसतात. डावीकडचा रस्ता खालच्या शिवालयाकडे जातो तर उजवीकडील रस्ता किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या शिवालयाकडे जातो. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी एका भग्न इमारतीचे अवशेष आहेत. हे बहुधा दारुकोठार किंवा शस्त्रागार असावे.
तिठा
खालचे शिवालय
इथून आम्ही खालच्या शिवालयाकडे गेलो. द्राविड शैलीत बांधलेल्या ह्या शिवालयाचा काल इसवी सनाच्या सहाव्या शतकातला आहे. एक छोटा प्रवेशमंडप, सभामंडप आणि प्रदक्षिणापथासह असलेले गर्भगृह अशी याची रचना, मात्र कालौघात इतर भाग पडून गेल्यामुळे आज फक्त गर्भगृह त्याच्या शिखरासहच शिल्लक राहिलेले दिसते. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर नक्षीकाम असून द्वारपाल आहेत. या मंदिराचे काही काम किंवा जीर्णोद्धार विजयनगरच्या राजवटीत देखील झाले आहे.
खालचे शिवालय
येथून समोरील पहाडात असलेल्या बदामी लेण्यांचे, बदामी गावाचे आणि अगस्ती तलावाचे मनोरम दर्शन घडते.
शिवालय बघून पुन्हा मागे आलो आणि पुढील किल्ला बघण्यास निघालो. थोडे पुढे जाताच एक वाट किंचित खालती उतरुन ध्वजस्तंभाच्या बुरुजाकडे जाताना दिसते.
बुरुजाच्या अलीकडे जमिनीतच अंतर्गत खोदलेली एक कोठी नजरेस पडते. हे बहुधा शस्त्रागार, दारुकोठार किंवा खजिन्याची खोली असावी.
ध्वजस्तंभाचा बुरुज
बुरुजावर असलेल्या जंघ्यांमधून बदामीचा परिसर आणि खालच्या बाजूस असणार्या मलिगेट्टी शिवालयाचे अप्रतिम दर्शन घडते. ह्या शिवालयास जाण्याचा मार्ग गावातून असून वेळेअभावी इकडे जाता आले नाही. द्राविड शैलीत असणारे हे आणि एका विशाल प्रस्तरावर उभारलेले हे चालुक्यकालीन शिवालय अत्यंत देखणे आहे.
मलिगेट्टी शिवालय
आलो तसाच परत मागे येऊन किल्ल्याच्या वरच्या भागाला लागलो. थोडे पुढे जाताच वाट उजवीकडे वळून खडकातच असलेल्या अजून एका प्रवेशद्वारापाशी येते.
धान्यकोठारे
प्रवेशद्वारातून आत आल्यावर या अरुंद वाटेने वर येताच आपण पोहोचतो ते इथल्या धान्यकोठारांपाशी. वाटेत खडकातच गणपती, नंदी आदी मूर्ती कोरलेल्या दृष्टीस पडतात.
धान्यकोठारे
इथली धान्यकोठारे एकदम वेगळ्या शैलीची. निमुळत्या घुमटाकार आकारात खालच्या बाजूस मोठ्या प्रस्तरखंड लावून आणि वरच्या भागात लहानलहान प्रस्तरखंड खुबीने बसवून ही निर्माण केलेली आहेत. आत जाण्यास लहानसे खिडकीवजा प्रवेशद्वार असून आतून ती पोकळ आहेत.
वरच्या भागात जाण्यासाठी प्रस्तरांच्याच खुंट्या केलेल्या आहेत. येथे बाजूलाच काही भग्न इमारतींचे अवशेष देखील आहेत.
वरचे शिवालय
धान्यकोठारे पाहून वर जाताच आपला किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश होतो व वरच्या शिवालयाचे दर्शन घडते. वाटेत एक भग्न इमारत असून आतमध्ये एक बांधून काढलेली एक खोल चौकोनी विहिर आहे. विहिरीवर एक छत देखील आहे.
भग्न इमारत आणि त्यापुढे शिखर दृश्यमान असणारे वरचे शिवालय.
येथून पुढे जातात पूर्णरुपात सामोरे येते ते शिवालय.
अगदीच कड्याच्या टोकावर असलेल्या पूर्णपणे द्राविड शैलीत असणार्या ह्या शिवालयाच्या सभामंडपाचा एका बाजूचा भाग आज अस्तित्वात आहे. मंडपातून गर्भगृहाचा प्रदक्षिणापथ आहे. प्रदक्षिणापथात उजेड येण्यासाठी चक्राकार नक्षी असणार्या सुरेख खिडक्या आहेत.
शिवालय
शिवालयाच्या सभामंडपावर हत्ती, सिंह आदींच्या प्रतिकृती असून पट्टीकांवर यक्षमूर्ती तसेच कृष्णाच्या जीवनातले काही प्रसंग कोरलेले आहे. एकूणातच वैष्णव मूर्तींचे येथे प्राबल्य असल्याने हे शिवालय मूळचे विष्णू मंदिर होते की काय अशी शंका घेण्यास येथे पूर्ण वाव आहे. सभामंडपालाही प्रदक्षिणापथ आहे. असे दुहेरी प्रदक्षिणापथ असणे ही चालुक्यकालीन शैलीची विशेषता.
सभामंडपातील मूर्ती
शिवालयाचे समोरून दर्शन
वरुन दिसणारे खालचे शिवालय
मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेला विदारण नृसिंह
गर्भगृहाच्या प्रदक्षिणापथात असणार्या चक्राकार देखण्या खिडक्या
हे शिवालय बघून परत निघालो, येथून आलो तसेच परत येऊन खाली भूतनाथ मंदिराकडे जाता येते किंवा थोडे पुढे जाऊन गुहेत असणार्या अंजनेय गुडीच्या मार्गाने खाली उतरून पलिकडच्या बाजूने वळसा मारून कप्पे आरभट्ट शिलालेखाच्या बाजूने खाली उतरुन भूतनाथ मंदिराकडे जाता येते. मात्र तो मार्ग इतका आकर्षक नाही त्यामुळे आम्ही ह्याच मार्गाने खाली उतरलो.
उतरताना पुन्हा पुन्हा अजस्त्र प्रस्तरखंडांचे दर्शन होतच होते.
पुराणवस्तु संग्रहालय
झपाझप उतरुन खालती संग्रहालयापाशी आलो. माणशी तिकीट पाच रूपये आहे. फोटो काढण्यास मात्र मनाई आहे. संग्रहालयात फारसे कुणी जात नाहीत मात्र हे न चुकवण्याजोगे आहे. आतमध्ये कृष्णलीला असणारी तोरणे, एका मंदिराचे दोन्ही बाजूस मूर्तीकाम असलेले एक अजस्त्र तोरण असून कित्येक चालुक्यकालीन भग्न मूर्तींचे अवशेष आहेत. मात्र येथील आवर्जून पाहण्यासारखे म्हणजे एक प्रचंड लज्जागौरी. मस्तकाच्या जागी कमल असलेली एक कुठेही भग्न न झालेली ही लज्जागौरी पाहणे म्हणजे एक अर्वणनीय अनुभव. अशीच एक लज्जागौरी महाकूट मंदिराच्या आवारात देखील आहे मात्र ती अर्धी भग्न झालेली आहे त्याबद्द्ल पुढच्या भागात येईलच. संग्रहालयाच्या आवारात देखील कित्येक मूर्ती ठेवलेल्या आहेत.
संग्रहालयची इमारत आणि किल्ल्याचे टेहळणी मंडप
खरे तर ह्याच भागात मल्लिकार्जुन, भूतनाथ मंदिरे आणि विष्णू गुडी बद्द्ल लिहायचे होते पण विस्तारभयास्तव त्याबद्द्ल पुढील भागात लिहिन.
क्रमशः
बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
उपप्रश्न: प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.
रच्याकने बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
हो, इकडे लाल गुलाबी, बदामी रंगाच्या वालुकाश्माचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे बदामी हे नाव, मात्र मूळचे नाव वातापि.
प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
नाही, दोन्हीकडे शैव वैष्णव दोन्ही पंथ कमीजास्त प्रमाणात सारखेच पसरलेले
होते. वैष्णव चालुक्य आणि विजयनगरच्या राजांनी शैव मंदिरेही मोठ्या
प्रमाणावर उभारलेली आढळून येतात.पट्टदकल आणि ऐहोळेची बहुतांशी मंदिरे ही
शैवच आहेत.
ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.
बदामीचे अजून एखाद दोन भाग झाल्यावर ऐहोळे सुरू करेन त्यानंतर पट्टदकल.
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी किल्ला उतरुन संग्रहालय पाहिले, हे संग्रहालय अगदी न चुकवण्याजोगेच आहे. ते पाहून आता अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिर पाहायला निघालो. आपल्या डाव्या बाजूला बदामी किल्ला आणि उजव्या बाजूस अगस्ती तलाव, आणि त्याच्या पलीकडे बदामीच्या लेण्या असे सुरेख दृश्य येथून बघायला मिळते. संग्रहालयाच्या पुढेच एक भग्न मंदिर आहे आणि त्याच्या पुढून एक वाट डावीकडे वळते. त्या वाटेने सरळ गेल्यास थोडक्या अंतरावर कड्यात एक शिलालेख आहे तो म्हणजे कप्पे अरभट्टाचा लेख.
कप्पे अरभट्ट शिलालेख
बदामी किल्लयावरुन अंजनेय गुहामंदिरावरुन किल्ल्याला वळसा घालूनही हा शिलालेख पाहता येतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे भूतनाथ मंदिराकडे जाताना डावीकडे वळूनही हा शिलालेख बघता येतो. ही जी डावीकडची वाट दिसते ती बदामीच्या डोंगरातून थेट जाते महाकूट मंदिर समूहाला. येथून महाकूट समूह आहे जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर मात्र ही फक्त पायवाट आहे. भरपूर वेळ असल्यास येथून चालत जाऊन महाकूट मंदिर समूह बघता येतो, अन्यथा गाडीवाटेने दहा/बारा किमी फिरुन महाकूटला जाता येते. महाकूट आपण नंतर बघणार आहोतच त्यामुळे त्याविषयी अधिक आता लिहित नाही. तर ह्या डाव्या वाटेने वळलो, उजवीकडे एक वस्ती आहे आणि डावीकडे बदामीचा कडा, येथून साधारण दिडशे मीटर अंतरावर कड्यात आहे इसवी सन ७०० मधील कप्पे अरभट्ट शिलालेख. कप्पे अरभट्ट हा एक योद्धा आणि कवी. हा शिलालेख आहे एक कन्नड काव्य. दहा ओळीत असलेल्या ह्या कन्नड लेखात ५ कडवी आहेत पैकी तिसरी आणि चौथी ओळ मिळून एक संस्कृत श्लोक आहे तर इतर ही कन्न्डमध्ये आहेत. पहिली ओळ सोडली तर इतर सर्व त्रिपदीत आहेत. हा लेख म्हणजे प्राचीन कन्नड काव्याचा एक नमुनाच. काही जण ह्याला पहिले कन्नड काव्य असेही मानतात. शिलालेखाच्या शेवटी एक चक्र आणि त्याच्या मध्ये आणि खालच्या बाजूस नक्षीकामही केलेले आढळते.
कप्पे अरभट्ट शिलालेख (जिथे कुंपण संपतं तिथेच वरील बाजूस आहे)
कप्पे अरभट्ट लेख पाहून परत मागे येऊन अगस्ती तलावाच्या काठाने भूतनाथ मंदिराकडे निघालो. वाटेतच एक सुंदर मंदिरसमूह आहे तो म्हणजे मल्लिकार्जुन समूह.
मल्लिकार्जुन मंदिर
बदामी, ऐहोळे, पट्टदकल मधील मंदिरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे येथील मंदिरे सहसा समूह रूपात दृष्टीस पडतात, म्हणजे एक मुख्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूने लहान लहान अशी काही मंदिरे, रूढार्थाने ह्याला पंचायतन असेही म्हणता येत नाही कारण मंदिरांची संख्या कमीअधिक आढळते तसेच ही बरेचदा ही उपमंदिरे इतर देवतांसाठी नसून त्यात शिवपिंडीच आढळतात. मल्लिकार्जुन मंदिरही हे असेच. तारकाकृती तळखड्यावर इसवीसनाच्या ११ व्या शतकात हे मंदिर बांधले ते उत्तर चालुक्यांनी (कल्याणीचे चालुक्य). एकावर एक थर असलेली मंदिरबांधणीची फांसना शैली हे उत्तर चालुक्यांचे वैशिष्ट्य. हे मंदिर याच शैलीत आहे.
उतरत्या छपरांचा मुखमंडप, त्यापुढे आयताकार बंदिस्त सभामंडप आणि त्यापुढे गर्भगृह आणि त्यावर फांसना पद्धतीचे शिखर अशी याची रचना. ह्या मंदिरात मूर्तीकाम नाही मात्र फांसना पद्धती समजण्यासाठी हे मंदिर आवर्जुन बघावे असेच.
मल्लिकार्जुन मंदिर मुखमंडप
मुखमंडप, सभामंडप आणि फांसना शिखर रचना
स्तंभयुक्त सभामंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग
उपमंदिरे
मल्लिकार्जुन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो ते येथील एका सुंदर मंदिराकडे अर्थात भूतनाथ मंदिराकडे
भूतनाथ मंदिर
हे बदामीतील सर्वांगसुंदर मंदिर. अगस्ती तलावाच्या ऐन काठावर वसलेले हे मंदिर पुढ्यातील विशाल तलावामुळे अधिकच खुलून दिसते. मंदिराच्या मागेच असलेला बदामीचा लालगुलाबी पहाड अगदी उठून दिसतो. भूतनाथ मंदिर देखील येथील इतर मंदिरांप्रमाणेच एकूटवाणे नसून एका समूहाच्या स्वरुपात आहे. मुख्य मंदिराची रचना काहीशी संमिश्र आहे. अंतराळ आणि गर्भगृहाचे शिखर हे द्राविड शैलीत असून ते बदामीच्या चालुक्यांनी बांधलेले आहे, तर उतरत्या छपरांचा सभामंडप हा कल्याणी चालुक्यांनी वाढवला. सभामंडप हा विविध स्तंभांवर तोललेला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शैव द्वारपालांची अपूर्ण राहिलेली शिल्पे आहेत तर त्यांच्या खालील बाजूस मकरवाहिनी गंगा आणि कूर्मवाहिनी यमुना अशी सरिताशिल्पे आहेत. तलावाच्या अगदी काठावर असूनही पुढ्यातील अगस्ती तलाव संपूर्ण भरला तरीही भूतनाथ मंदिरात पाणी शिरत नाही याचे कारण म्हणजे तलावाचा लेणीकडील बाजूस अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी एक वाट निर्माण केली आहे. मुख्य मंदिराची भोवती काही उपमंदिरे असून एकात लकुलिश शिवाची एक मूर्ती आहे.
भूतनाथ मंदिर
भूतनाथ मंदिर
गर्भगृहाच्या बाहेर नंदी असून आतमध्ये शिवलिंग आहे.
द्राविड पद्धतीचे शिखर असलेले भूतनाथ मंदिर व त्याच्या बाजूस असलेली उपमंदिरे
भूतनाथ मंदिर समूहाच्या मागेच असलेल्या एका विशाल प्रस्तरावर आहे विष्णूगुडी अर्थात विष्णूचे मंदिर.
विष्णूगुडी
मागच्याच प्रचंड खडकावर फांसना शैलीतले एक लहानसे मंदिर आहे, हौशी लोक त्या खडकावर जाऊन तलावात उड्या मारत असल्याने तेथे जायची वाट पुरातत्त्व खात्याने बंद केली आहे तरी हे लहानसे मंदिर विलक्षण सुंदर दिसते.
खडकावरील लहानसे मंदिर
ह्या प्रस्तराजवळ गेलो असता खडकातच उंचावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. जणू मूर्ती कशी खोदावी ह्याचा सराव करण्यासाठीच ह्या कोरण्यात आल्या असाव्यात. ह्या मूर्तींमधे आहेत वराह, गणेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, महिषासुरमर्दिनी आणि हिरण्यकश्यपूचे विदारण करणारा उग्र नृसिंह.
उग्रनृसिंहाच्या बाजूलाच द्राविड पद्धतीचे एक मंदिर कोरलेले दिसते.
ब्रह्मा, विष्णू, महेश
डाव्या बाजूस प्रस्तरावर जाणारी वाट आहे जी सध्या बंद केलेली आहे.
हे बघून परत मागे न फिरता प्रस्तराला उजव्या बाजूने वळसा घालून थोडक्या पायर्या उतरल्यावर दिसते एक अनंतशयनी विष्णूचे मंदिर अर्थात विष्णूगुडी. अर्धे बांधीव आणि अर्धे खडकात कोरलेले शिखरविहिन असे हे मंदिर अगदी न चुकवण्याजोगेच. ह्या मंदिरात अनेक आश्रर्ये दडून बसलेली आहेत.
अनंतशयनी विष्णू मंदिर
मंदिरात समोरच अनंतशयनी अर्थात शेषावर शयन करणारी मूर्ती आहे मात्र ती बघण्याआधी आपण ह्या मूर्तीच्या डाव्या बाजूस असलेली त्रिमूर्ती मूर्ती बघू. ही त्रिमूर्ती विराजमान झाली आहे ती द्राविड पद्धतीने कोरलेल्या मंदिरात. विष्णू, शिव आणि ब्रह्मा अशा ह्या मूर्तींचा क्रम. विष्णूच्या खाली गरुड पूर्णपणे कोरला आहे तर शिवाच्या आणि ब्रह्माच्या मूर्तीखाली अनुक्रमे नंदी आणि हंसाची फक्त बाह्यरेषा कोरलेली आहे. हे काम अर्धवटच राहिलेले दिसते.
त्रिमूर्ती
ह्या मूर्तीच्या समोर आणि अनंतशयनी विष्णूच्या उजव्या बाजूस आहेत नमन करणारे साधक आणि त्यांच्या बाजूस एक गाय आणि तिचे दुग्धप्राशन करणारे वासरु.
आता मुख्य अनंतशयनी विष्णूची मूर्ती पाहूयात.
प्रथमदर्शनी येथील मूर्ती ओबडथोबड दिसेल आणि संगमरवरात कोरल्यासारखी वाटेल पण ती तशी नसून आतल्या खडकात ती कोरलेली असल्याने खडकांमधील रेषा मूर्तीवरही आलेल्या दिसतात.
शेषावर पहुडलेला विष्णू अतिशय देखणा असून विष्णूच्या उशापाशी एक सेवक आहे तर लक्ष्मी त्याचे पाय चुरत आहे. लक्ष्मीच्या शेजारी गरुड नमस्कारमुद्रेत उभा आहे. विष्णूच्या नाभीतून कमळ उमललेले आहे. कमळाचा देठ हा विष्णूच्या हातामागून मोठ्या खुबीने कोरलेला आहे. विष्णू हा आराम करत असल्याने शंख, चक्र, गदा ही त्याच्या बाजूस ठेवलेली असून त्याने फक्त पद्म धारण केले आहे. विष्णूच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.
अनंतशयनी विष्णू
मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, त्याच्या बाजूला नाभीकमलाच्या वरील बाजूस असलेला ब्रह्मा त्याच्या शेजारी परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि सर्वात शेवटी घोड्यावर आरुढ कल्की देखील आहे.
दशावतार
बदामीस आलात तर हे मंदिर अजिबात चुकवू नये असेच.
इथे यावे आणि तलावाच्या पाण्यात पाय सोडून तासनतास बसावे.
साधारण दिड दोन वाजत आले होते आणि प्रचंड भूकही लागली होती म्हणून आम्ही येथून बदामी गावात जेवायलो गेलो आणि आता पुढचे पडाव होता तो सिदलाफडीत, तिथली प्रागैतिहासिक गुहाचित्रे पाहण्यासाठी.
सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
खरं तर सिदलाफडीच्या प्रागैतिहासिक गुहेबद्द्ल, तिथल्या चित्रांबद्द्ल माहिती असूनही तिथे जाणे आमच्या मूळच्या योजनेत नव्हतं. एकतर वेळेच्या नियोजनात ते नीट बसत नव्हतं. शिवाय त्यासाठी भरपूर तंगडतोड आवश्यक होती. आणि कालच्या ऐहोळे-पट्टदकलला (ह्याबद्द्ल पुढे लिहिणार आहेच) सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चालणं झालं होतं त्यामुळे आजच्या दिवशी बदामी किल्ला, भूतनाथ मंदिर समूह आणि दुपारनंतर महाकूट आणि बनशंकरी पाहायचे असे ठरवले होते. मात्र ऐहोळे आणि बदामीच्या दोन्ही संग्रहालयात सिडलाफडीची छायाचित्रे पाहून तिथे जायची उर्मी जागृत झाली आणि आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून जेवल्यानंतर लगेचच महाकूट आणि सिदलाफडीला जाण्याचे ठरवले. आधी सिदलाफडी की आधी महाकूट असे ठरवताना महाकूटला संध्याकाळ झाली तरी चालण्यासारखे होते मात्र सिदलाफडीचा रस्ता अगदी निर्जन असल्याने ते आधी करण्याचे ठरवले आणि सिदलाफडीला निघालो. बदामीपासून बदामी रेल्वे स्टेशन्/ऐहोळे जाण्याच्या वळणाआधीच हॉटेल पॅराडाइझच्या बाजूलाच सिदलाफडीला जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला एक उद्यान आणि एक कमान आहे. ह्या कमानीतूनच पुढे सिदलाफडीला पोहोचता येते. मात्र हा रस्ता पूर्ण चढणीचा आणि कच्चा आहे. येथून फक्त ट्रॅक्टरसारखीच वाहने जाऊ शकतात. कार अजिबात जाऊ शकत नाही. कमानीजवळच असलेल्या उद्यानापाशी गाडी लावली आणि पुढे निघालो.
सिदलाफडीला जाणारा हा रस्ता जवळपास चार किलोमीटर अंतराचा आहे. जवळपास
निम्मा टप्पा चढणीचा आहे आणि उरलेला निम्मा सपाटीचा आहे. खुरट्या झुडपांतून
जाणार्या ह्या रस्त्यावर कुठेही सावली नाही, त्यामुळे उन्हाळ्यात
भरदुपारी येथे येताना भरपूर पाणी आणि इथल्या तीव्र उन्हातून चालण्याची
मानसिक तयारी आवश्यक. इथून जाताना सुरुवातीचा चढ चढून गेल्यावर एक
रेडियो/टीव्ही टॉवर लांबवर आपल्या डाव्या हातास दिसतो. रस्ता चांगलाच रूंद
आणि मळलेला आहे. आपण सरळ ह्या टॉवरच्या दिशेने चालू पडायचे. सुरुवातीच्या
चढाईने छातीचे झालेले भाते आता एका लयीत आलेले असतात आणि आपण वेगाने
टॉवरपाशी आलेलो असतो. आपण बदामीच्या डोंगराच्या माथ्यावर आलेलो असतो आणि
आता आपली पुढची चाल समपातळीवरुन होणारी असते.
सिदलाफडीला जाणारा रस्ता
इथपर्यंत तीव्र चढण आहे. एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला ह्या टॉवरपाशी जायचे आहे, आणि ठळक रस्ता आपल्याला तिथेच घेऊन जातो.
चुकण्याचा संभव ह्या टॉवरपाशीच आहे. सरळ जाणारा रूंद रस्ता पुढे खालच्या बाजूस असलेल्या एका लहानशा वस्तीपाशी जातो. आणि डाव्या बाजूस वळलेली एक वाट शंभरएक मीटरवर खडकाळ मार्गामुळे हरवून गेलेली दिसते. मात्र टॉवरपाशीच आपण पोहोचायचे हे अवश्य लक्षात असू द्यावे.
टॉवरपाशी परत आपल्याला एक रूंद वाट लागते जी पोहोचवते सिदला फडीला. वाटेत निसर्गाची अनेक भूरुपे दिसू लागतात. माथ्यावरच्या वार्यांमुळे, पावसामुळे येथील वालुकाश्मांचे विदारण होऊन अनेक लहान लहान टेकड्यांसदृश खडक येथे दिसू लागतात.
टॉवरच्या पुढची पायवाट
विविध प्रकारची भूरुपे
टॉवर आता मागे पडला होता
सिदला फडीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे निर्जन आहे. मात्र येथे जनावरांची तशी भिती नाही, मात्र वाटेत आम्हाला केसांचा समावेश असलेल्या वन्यप्राण्यांच्या काही विष्ठा दिसल्या त्यावरुन येथे बिबट्या, तरस, अगदीच कुणी नसले तरी खोकड, कोल्हे असावेत असे वाटते. अजूनही मात्र गुहेचे दर्शन होत नसल्याने पुढे जाताना आपण चुकल्याचे जाणवत राहते पण प्रत्यक्षात तसे नाही. खाली रस्त्यानजीक गाडी लावल्यापासून सुमारे चार किमीची दमदार वाटचाल करुन आपण सिदलाफडी नजीक पोहोचलेलो असतो. अचानक एका वळणापुढून समोर एक कातळ दृगोच्चर होतो, तिच ही सिदलाफडी.
सिदलाफडीचे प्रथम दर्शन
थोडे पुढे जाताच सिदलाफडीची नैसर्गिक कमान दृष्टीपथास येते.
येथून कमानीत जाताना किंचीत खालच्या पातळीवर उतरावे लागते आणि आता सिदलाफडी तिच्या पूर्ण रुपासह आपल्याला सामोरी आलेली असते.
सिदलाफडीचा शब्दशः अर्थ म्हणजे विजेचा खडक. अर्थात येथील कमानीवर वीज पडून येथील छिद्रे तयार झाली आहेत अशी समजूत. दुरुन लहान दिसणारी ही नैसर्गिक कमान प्रत्यक्षात मात्र बरीच रूंद आहे आणि जवळपास तीन पुरुष उंचीची आहे. कमानीत वरच्या बाजूस छिद्रे असल्याने आतमध्ये पुरेसा प्रकाश आहे. आदिमानवांना ही निवार्यासाठी ही आदर्श जागा वाटल्यास त्यात काहीच नवल नाही. खालच्या पातळीवर असल्याने ऊन वार्यांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते. आपल्या फावल्या वेळात आदिमनावांनी करमणूक म्हणून येथे सफेद रंगात चित्रे रंगवलेली आहेत. आजमितीस ह्या चित्रांचे स्वरुप बरेचसे अस्पष्ट आहे. येथील वालुकाश्म हा ठिसूळ असल्याने आतील भिंतीची झिरपणार्या पाण्याने बरीच हानी झालेली आहे त्यामुळे ह्या चित्रांबद्द्ल तर्कच लढवावे लागतात. संशोधकांनी ह्या चित्रांचा कालावधी कमीतकमी ३००० वर्षे जुना असा मानला आहे. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर काही स्पष्ट तर काही अस्पष्ट अशी चित्रे नजरेस पडतात.
सिदलाफडीचा नैसर्गिक निवारा आतील बाजूने
गुहेच्या वरच्या भागातील छिद्रे जी वीजेमुळे पडली आहेत असे मानले जाते.
आता काही चित्रे पाहूयात.
हे एका लहान मुलीचे चित्र दिसते
इथले सर्वात सुस्पष्ट आणि चटकन ओळखू येणारे असे चित्र म्हणजे बैलाचे
हे पक्ष्याचे चित्र दिसतेय. त्याची चोच, मस्तक, शरीर, पाय नीट दिसतात. बाजूला त्याची पिल्ले किंवा इतर काहीतरी पायांसारखी चित्रे आहेत
हा बहुधा विंचू किंवा चार पायांवर चालणारा कुणीतरी प्राणी
हे चित्र नीटसे ओळखू येत नाही, कुणीतरी प्राणी असावा. ही चित्रे खूपच अस्पष्ट असल्याने आपल्याला येथे ती ओळखण्यासाठी आपल्या कल्पनांना पूर्ण वाव आहे.
हे बहुधा शिकार्याचे चित्र असावे
येथे अजूनही काही चित्रे दिसत राहतात, त्यात हल्लीच्या नवकलाकारांची कलाकारीही दिसते. प्राचीन वास्तूंची हानी होण्याचा शाप ह्या स्थळालाही मिळाला आहेच.
खरे तर येथील चित्रे सरकारने संरक्षित करणे आवश्यक आहे अन्यथा मनुष्यांच्या वावराने येथील चित्रांचा लवकरच नाश होईल. सिदलाफडीबाबत मात्र एक सांगणे अगत्याचे वाटते ते असे की येथे भीमबेटकासारखी अद्भुतरम्य चित्रे, अत्यंत सुस्पष्ट चित्रे असतील, संख्येने भरपूर चित्रे असतील अशी कल्पना करुन अजिबात येऊ नये. येथील चित्रे अगदी साधी, चुन्याने रंगवलेली अशी पांढर्या रंगाचीच आहे. मात्र येथे येणारी सुरेख वाट, सुरेख कमान आणि आपण हंटर - गॅदरर्सच्या जगातील प्रागैतिहास असं काही अद्भूतरम्य पाहतो आहोत जे आपण पूर्वी कधीही पाहिलेले, अनुभवलेले नाही असे वाटणार्यांनी येथे हमखास आणि अवश्य यावे. बदामीस येऊन हे ठिकाण न चुकवण्याजोगेच.
आता जवळपास चार वाजत आलेले होते. पुढचे महाकूट करायचे असल्याने आम्ही येथून निघालो. टॉवर पार करुन आता पुढे उतार असल्याने झपझप चालत गाडीपाशी आलो आणि तेथून महाकूटला निघालो. मात्र महाकूटवर लिहिण्याआधी आदल्या दिवशी केलेल्या ऐहोळे आणि पट्टदकलचा वृत्तांत अजून लिहायचा असल्याने आधी ऐहोळे आणि पट्टदकलविषयी लिहून नंतरच महाकूटवर लिहिन.
आता पुढच्या भागात ऐहोळे.
क्रमशः
शिल्पट समजण्यासाठी पौराणीक कथा माहीत असायला हव्यात. एकाच ठिकाणी वेगवेगळे देव आणि वाहनं आहेत.
तो शिलालेख मुख्य गुहांपासून दूर का लिहिला यांचे कारण त्यांच्या कालखंडात
आणि करवणाऱ्या व्यक्तींचे राजकारणातले स्थान वेगळे असणार.
राजा,मंत्री,सेनापती,नगरातील महाजन ,श्रेष्ठी वगैरे.
अनंतशयनाच्या बाजूलाच अगस्ती गुहा आहे ती पाहायला विसरलात. पण इकडे पाट्या
लावलेल्या नाहीत आणि सांगायला,विचारायला कुणी दिसत नाही. तिथे राखलेल्या
बागेसारख्या आवारातून तर्क केला की इथे काही असावे. आणि पुढे गेल्यावर एक
दोनफुटी उंच फाटक खडकाखाली दिसले. त्यास कुलुप नव्हते. मग ते उघडून वाकून
घसरत आत गेल्यावर गुहा सापडली. पंधरा फुटी उंच आहे आणि शिल्पं आहेत. इथे जर
का पर्यटक आणि शालेय सहली आल्या तर झुंबड उडेल. म्हणून मुख्य बदामी गुहा
दाखवणारे गाईड इकडे "काही नाही" सांगतात. हा भाग वर्ज्य आहे. आपण जाऊ शकतो.
सिदलाफडी खरंच आवडलं. जायला हवं.
तो शिलालेख मुख्य गुहांपासून दूर का लिहिला यांचे कारण त्यांच्या कालखंडात आणि करवणाऱ्या व्यक्तींचे राजकारणातले स्थान वेगळे असणार.
बदामीत असंख्य शिलालेख आहेत जिकडे पाहावे तिकडे कन्नड लिपीतले लेख दिसतातच. अगदी किल्ल्याच्या वाटेवरील कातळ भिंतीत देखील बरेच लेख दिसतात. पुलकेशीचा एक शिलालेख तर कड्यात सुमारे १३५ फूट उंचीवर आहे. तो पाहायचा म्हणलं तर रोप क्लाईंब करुन किंवा रॅपलिंगनेच पाहाता येतो.
शिलालेखात अश्या "अर्थाचे" कोरलेले आहे का ?
कप्पे अरभट्ट हा, पब्लिकच्यासाठी मायबापाहून कृपाळु, दयाळु आहे,
परंतु शत्रुच्यासाठी अतिक्रूर आहे ... (हूँ यारों का मैं यार, दुश्मनों का दुश्मन)... (जो नडला त्याला फोडला .. )
ह्या कलियुगात एक माधव (विष्णु) चा अपवाद वगळता, कप्पे अरभट्ट जैसा कोई हार्डइच नै है ...
फोटो नेहमी द्विमितीय असल्याने त्यांमधून मूळच्याआकारमानाची कल्पना येत नाही हे खरेच.
पण सिदलाफडीच्या भव्यतेची कल्पना येण्यासाठी एक छायाचित्र इथे देतो.
रस्ता चुकण्याची शक्यता अधीक दिसते
नाही, रस्ता चुकण्याची शक्यता इथे जवळपास शून्य आहे. टॉवरच्या इथेच वळायचे हे लक्षात ठेवायचे तुम्ही थेट सिदलाफडीपाशीच पोहोचता मग.
कप्पे अरभट्ट लेखाच्या खाली जे वर्तुळाकृती कोरिवकाम आहे ती राजमुद्रा टाईप काही आहे का?
ती राजमुद्रा नाही, चालुक्यांच्या राजमुद्रेत, सूर्य, शंख, चक्र आणि वराह सामावलेले आहेत. कप्पे अरभट्ट लेखात फक्त नक्षीदार चक्र आहे.
http://www.misalpav.com/node/50596
बदामी -
कंजूस काकांचा मिसळ पाव वरचा लकुंडी चा धाव वाचून तिकडे/जायच नक्की केल. गदग लकुंडी - विजापूर . एका मित्राला विचारला कि येणार का? तो म्हणाला कि लकुंडी पेक्षा बदामी करू . मी आधीच मागच्या वर्षी बदामी ला जाऊन आलो होतो पण त्याच्यासाठी म्हणून मग लकुंडी च्या ऐवजी बदामी करू असा ठरवलं तो तिकडचाच असल्यामुळे भाषेची अडचण पण येणार नव्हती. पुणे ते गदग रोज रात्री एक वाजता ट्रेन असते शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन ला जाऊन तिकीट काढले. रेल्वे मध्ये काहीच गर्दी नव्हती त्यामुळे जाताना आरामशीर जागा मिळाली आणि सकाळी ६ पर्यंत झोप पण झाली तोवर ट्रेन ने महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये प्रवेश केला होता. अलमट्टी धरणाचा परिसर हिरवीगार शेती आणि मधेच सूर्यफुलाची शेती असं दृश्य बघत आमचा प्रवास सुरु होता. साधारण ८ वाजता आम्ही विजयपूरा मध्ये होतो तेव्हा आमच्या डोक्यात विचार आला कि आज इथेच उतरून आधी विजयपुरा बघून घेऊ आणि मग रात्री बदामी ला जाऊयात. पण दुसरा दिवस जवळपास प्रवासातच वाया गेला असता म्हणून थोडा उशीर झाला तरी बदामी मध्ये जाऊन बदामी बगुन घेऊ आणि मग त्याच रात्री विजयपुरा ला येउयात असा ठरवलं. साधारण १२ वाजता बदामी ला पोहोचलॊ. बदामी हे एकदम छोटा रेल्वे स्थानक आहे. तिथे गेल्या गेल्या काळ्या तोंडाच्या माकडांनी आमचा स्वागत केला. त्याचा फोटो काढायला गेलो हे त्याने बघितला तर ते एकदम चवताळून अंगावर यायला लागला मी शांतपणे मोबाइल खाली घेतला आणि पुढे निघून गेलो तस ते शांत झाल. बाहेर पडल्या पडल्या नेहमीप्रमाणे रिक्षा वाल्यानी गराडा घातला तिथेच एक रिक्षा ७०० रुपयांमध्ये दिवसभर च्या प्रवासासाठी ठरवून घेतली त्यात तो आम्हाला बदामी शाकंभरी मंदिर अजून एक शिव मंदिर आणि पट्टडकल आणि ऐहोले आणि परत बदामी असा सोडणार होता. तिथे गेल्या गेल्या नाश्ता केला पुरी भाजी , इडली, पुलाव आणि चहा. खाऊन झाल्यावर रिक्षा ने आम्हाला बदामी गुहांच्या तिकीट खिडकीजवळ सोडल. २५ रुपये प्रति व्यक्ती अस तिकीट घेऊन आम्ही बदामी गुहा, बदामी तलाव , बदामी किल्ला असा पाहून खाली आलो. म्युझीयम बघायचा होत पण उंच पायऱ्या चढून मित्राचा गुडघा दुखायला लागला होता. म्हणून मग शाकंभरी मंदिर आणि शिव मंदिर पाहून पट्टडकल कडे गेलो
ट्रेन
सूर्यफुलाची शेती. चालत्या गाडीतून फोटो घेतल्यामुळे फोटो धूसर आला आहे
अलमट्टी धारण बॅकवॉटर
फोटो काढताना बघून चवताळलले माकड
अजून एक
गुहा
शिल्पे
शिल्पे
शिल्पे
शिल्पे
शिल्पे
गुहा वरचा टप्पा
बदामी गुहांपासून दिसणाऱ्या तलावाचे विहंगम दृश्य
शिल्पे
नक्षीदार खांब
शिल्पे
शिल्पे
माहिती फलक
तलावाजवळील मंदिर
तलाव आणि भूतनाथ मंदिर
भूतनाथ मंदिर- जवळून फोटो
सर्व फोटो स्पष्ट आणि छान आले आहेत. तुम्ही सर्वच पाहिलंत आणि ७०० रुमध्ये ओटो स्वस्तात झालं.
मुंबई - सोलापूर- बिजापुरा ( वाजापूर)-बदामी -गदग गाडी आता दोन वर्षांतच
सुरू झाली आणि खूप कामाची आहे या सहलीला. २०१२,२०१४ असे दोनदा गेलो पण
त्यावेळी बिजापूर पसेंजर होती आणि दुपारी एक वाजता पोहचून,हॉटेल घेऊन झटपट
गोलगुंबज अधिक मुल्क ए मैदान तोफ पाहता आली. पण या गाडीने सकाळी आठ वाजता
पोहोचून दिवसभरात आणखी दोन गोष्टी ( बारा कमान, बुरुज) आरामात पाहता आल्या
असत्या. तिकडे कानडी येणारा बरोबर असल्यास ऐहोळेला उपयोग होतो.
बदामी म्युझिअम ( लज्जागौरीचे शिल्प आहे), आणि मागची डोंडरावरची शिवालये पाहिली का?
फोटोंमधून पुन्हा नेलंत.
रेल्वेने जाण्याचा फायदा ( कारने जाण्यापेक्षा)म्हणजे (१)रात्रीची झोप
सर्वांचीच झाल्याने सकाळी पर्यटनास लगेच निघता येतं आणि (२)आलमटी धरणाच्या
किनाऱ्याने गाडी वीस मिनिटे वळणे घेत जाते ते पाहायला मिळतं.
नटराज शिव, शिव-पार्वती मूर्ती छान आहेत. त्रिविक्रम मूर्ती, अर्ध्य देणारा बळी राजा, बाजूला अडवणारा शुक्राचार्य आणि भग्न वामन त्याच्या छत्रीसह उठून दिसतोय. नमुची त्रिविक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करतोय.
बदामी गुहा , तलाव आणि भूतनाथ मंदिर बघून आम्ही डोंगर चढायला चालू केला. पावसाची अजिबात चिन्हे नव्हती आणि गरम तर एवढा होत होता कि जस काही उन्हाळाच आहे आणि पाण्याची बाटली पण गाडीतच राहिली आणि जवळपास कुठेही पाणी नव्हता मग तसच जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आधी डोंगरावर जाऊन येऊ मग म्युझीयम बघूयात असा ठरवून आम्ही चालायला सुरुवात केली. डोंगरावर दोन शिवालय आहेत एक छोट आहे येथे एक तोफ ठेवलेली आहे. आणि दुसरा बऱ्यापैकी मोठ आहे वरून बदामी शहर, गुहा आणि तलाव यांचा मनमोहक दृश्य दिसत. हे सगळं बघायला १ - २ तास पुरतात. वर काही ४ - ५ टारगट मुले आम्हाला त्रास द्यायच्या उद्देशाने आमच्या जवळ आले पण मित्र त्यांच्याशी कन्नड भाषेत बोलायला लागल्यावर मग निघून गेले. वर लोकच नव्हती मोजून ८ -१० लोक असतील पण याचा फायदा आम्हाला शांतपणे फोटो काढण्यासाठी झाला. गुहा आणि म्युझीयम बघून लोक जात होते बहुतेक. वर जाईतोवरच मित्राचे गुडघे दुखायला लागले होते सगळ्यात शेवटच शिवालय न बघताच जाऊ असा म्हणत होता पण आता थोडच राहिलाय असा सांगून त्याला वर नेल. खाली येताना मात्र त्याने आधीच रिक्षा वाल्याला फोन केला आणि घ्यायला यायला सांगितलं मग आम्ही म्युझीयम न बघताच शाकंभरी मंदिराकडे गेलो
डोंगरावर जाताना दोन मोठ्या शिळा एकमेकांसमोर आहेत इथून आपण एका वेगळ्याच विश्वात जातो.
निम्न शिवालय
निम्न शिवालय माहिती फलक
निम्न शिवालयाच्या मागे ठेवलेली तोफ
निम्न शिवालयाच्या इथून दिसणारा नजारा
निम्न शिवालयाच्या इथून दिसणारा नजारा
बुरुज
शिवालय
शिवालय
शिवालय - जवळून
शाकंभरी मंदिर - प्रवेशद्वार
शाकंभरी मंदिर - परिसर
मंदिराच्या आत मध्ये फोटो काढायला मनाई होती म्हणून मग जास्ती फोटो काढले नाहीत. मंदिरात बरीच गर्दी होती ३ - ४ रांगांमधून गेल्या नंतर आमचा नंबर आला. जलद दर्शन सुविधा इथे पण होती बहुतेक काही लोक पास घेऊन थेट दर्शन घेत होते
याच्या नंतर आम्ही अजून एका मंदिरामध्ये गेलो हे मंदिर बरेच प्रशस्त होते. आत कुंड होते तिथे बरेच लोक अंघोळ करत होते
मंदिराचे प्रवेशद्वार
गणेश मूर्ती
नंदी
मंदिराच्या बाजूला असलेले शिल्प
मंदिराच्या बाजूला असलेले शिल्प
कुंड
वीरभद्र
हे सगळं बघून आम्ही निघालो पट्टडकल ला. या मंदिरापासून पट्टडकल साधारण १७ - १८ किमी होत.
रात्री व्यवस्थित झोप झाल्यामुळे बराच ताजतवान वाटत होत. मी आवरून घेतला आणि नाश्त्याची सोय कुठे आहे ते पाहायला बाहेर खोलीतून बाहेर पडलो. दक्षिण भारतीय नाश्ता होता. इडली, उडीद वडा , अननस चा शिरा, डोसे, सफरचंद. मित्राच आवरत होता म्हणून मग मी फक्त चहा घेतला आणि त्याची वाट पाहत बसलो. थोड्या वेळात तो आल्यावर आम्ही खाऊन घेतलं आणि त्याच्या साडू ला फोन केला. त्याने सांगितलं कि तुम्ही गोलघुमट बघून घ्या मला यायला वेळ लागेल.
हॉटेल
हॉटेल
नाश्ता
हॉटेलच्या आवारातील फुलाचा फोटो
गोल घुमट प्रथम दर्शन
म्युझीयम
म्युझीयम च्या बाहेर ठेवलेल्या तोफा
गोल घुमट
गोल घुमट
गोल घुमट
गोल घुमट - आतून
गोल घुमट
गोल घुमट
गोल घुमटाच्या बाजूला असलेली प्रतिकृती
गोल घुमट - गॅलरी इथे सगळे लोक प्रति ध्वनी साठी ऐकण्यासाठी खूप आवाज
करत होते. शिवाय गॅलरी ची उंची पण खूप आहे वरून खाली पाहिल्यास धडकी भरते
गॅलरी मध्ये जाण्यासाठीचा जिना
गोल घुमट पाहून झाल्यावर म्युझीयम मध्ये गेलो. तिथे फोटो काढण्यास मनाई
आहे म्हणून फोटो काढता आले नाहीत. तिथे सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे
दगडांमध्ये कोरलेली साखळी त्याला कुठेही जोड नाही किंवा एकमेकांमध्ये
अडकवलेले नाहीत
तिथून जवळच बाराह कमान आहे तिथे गेलो
बाराह कमान - स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांच्या
आक्रमणाच्या भीतीमुळे सगळे पळून गेले म्हणून मग हे बांधकाम अर्धवट राहिले
बाराह कमान
बाराह कमान
महात्मा बसवेश्वरांच स्मारक - इथून बाराह कमान जवळ आहे आणि शिवाय इथे अत्यल्प दारात थाळी जेवण पण मिळू शकता
नंतर आम्ही एक बाग होती जिथे वेगळ्या वेगळ्या हिंदू देव देवतांच्या मूर्ती होत्या तिथे गेलो
प्रवेश द्वारावरील मूर्ती
शिव मूर्ती
अतिशय सुंदर काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती
इथून पुढे आम्ही उपल बुरुज जोड घुमट, आणि इब्राहिम रोझा बघितला जेवायची वेळ झाली होती मग जेवण केला आणि संध्याकाळी ५ वाजताची गाडी असल्यामुळे बाकी ठिकाण सोडून रेल्वे स्टेशन ला गेलो
उपल बुरुज
बुरुजावरील तोफ
जोड घुमट - दोन्ही घुमटांचे एकत्र असे फोटो इथे काढता आले नाहीत. कारण या घुमटांना मशिदीमध्ये बदलेले आहे
इब्राहिम रोझा
इब्राहिम रोझा
इब्राहिम रोझा
इब्राहिम रोझा
गोल घुमट - गॅलरी इथे सगळे लोक प्रति ध्वनी साठी ऐकण्यासाठी खूप आवाज करत होते. शिवाय गॅलरी ची उंची पण खूप आहे वरून खाली पाहिल्यास धडकी भरते - धाग्यामध्ये एकच फोटो चुकून दोनदा आला आहे त्याच्याऐवजी खालचा फोटो द्यायचा होता
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.