https://www.misalpav.com/tourism/53715 -१
https://www.misalpav.com/tourism/53727 -२
आम्हांला आता पिंजोर गार्डन कडे प्रस्थान करायचे होते........
आता पुढे.
राॅक गार्डनपासून पिंजोर गार्डन वीस किलोमीटर अंतरावर आहे. वरिष्ठ नागरिक म्हणून का कुणास ठाऊक मला कुटुंबासोबत इनोव्हा टाईप छोटी गाडी मिळाली. इतर पर्यटक टेंम्पो ट्रॅव्हलर्स मधे बसले.गाड्या पिंजोर गार्डनकडे निघाल्या.
चालक गब्रू जवान, त्याच्या बोलण्यात हिन्दी कमी आणी पंजाबी शब्दच जास्त येत होते.डेकवर टपोरी,"जुगनी"चे गाणे ऐकू होते.
चार वर्ष पंजाबमधे कार्यरत होतो.पंजाब मधला सर्वात कठीण समय होता.राज्यातली पुर्वस्थिती आणी मुख्य स्वर्णमंदिरावर झालेल कारवाई जवळून अनुभवली होती. प्रदीर्घ वास्तव्यामुळे थोडीफार पंजाबी भाषा समजते.गाण्याचे काही शब्द समजत होते. चालकाला म्हणालो गुरदास मानचे गाणे लाव.पंजाबीत उत्तर देत त्याने चॅनेल बदलला,म्हणाला "साढा प्यों भी माण(गुरूदास) दे ही गाने सुन्दा है गा". म्हणजे माझे वडील पण गुरदास मान चे च गाणे ऐकत असतात. "जुगनी",एक फार जुना आणी लोकप्रिय पंजाबी लोकसंगीताचा प्रकार आहे. याला खुप मोठा इतिहास आहे.चला,आता विषय निघालाच आहे तर याबद्दल जाता,जाता चार शब्द सांगतो.....
"जुगनी",म्हणजे जुगनूची बायको (काजवा, Female Firefly). पंजाबी लोकसंगीतातली "जुगनी", स्वतंत्र विचारांची, विद्रोही, बिनधास्त,बंडखोर प्रतीकात्मक लोकनायिका आहे.समाजीक राजकिय,अध्यात्मिक,प्रेम इ.विषयांवरी गाण्यात "जुगनीचा ". नायिका म्हणून वावर लोकांना खुप भावतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी देशभक्तांनी या लोकनायीकेचा आपले विचार जनमानसात पसरवण्यासाठी उपयोग केला. (जसा बहिर्जी नाईक यांनी अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी केला होता. त्यांचे गाणे होते, "बाजीराव नाना तुम्हीं लग्नाला चला,तुम्हीं लग्नाला चला....")
१८५७ मधे रावी नदीच्या काठावर स्वातंत्र्या सैनिकांना ब्रिगेडियर जाॅन निकोलसन बरोबर लढताना विरगती प्राप्त झाली.त्यांच्या शौर्य गाथा याच लोकसंगीतातून गुंफून गायल्या गेल्या होत्या.
१९०८ मधे सरकारने या लोकसंगीतावर बंदी आणली होती. १९६० मधे "आलम लोहार", या सुफी गायकाने लोकसंगीतावर अधुनिक साज चढवून नवे रूप प्रचलित केले. "जुगनी",चा इतिहास बराच मोठा आहे.सध्या दलजीत दोसांज,रब्बी शेरगिल सारखे आघाडीचे गायक हे लोकसंगीत अधिक लोकप्रिय करत आहेत.
"जुगनी",ची जशी प्रेमगीते,सुफी गाणी आहेत तशीच XXX गाणी पण प्रसिद्ध आहेत. भाषा अतीशय खडी आणी अश्लील असल्याने इथे गाण्याचे बोल देऊ शकत नाही.(सैन्यात सर्व भाषिक सैनिक असल्याने सर्वच भाषातले थोडे थोडे शब्द परिचयाचे होतात.(विशेष करून शिव्या,टपोरी शब्द पटकन आत्मसात होतात.) असो, "जुगनी", पुराण इथेच थांबवतो कारण आपण पिंजोर गार्डन जवळ आलो आहे.
राॅक गार्डन सोडल्या पासून भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीत हळूहळू बदल होत होता.सपाट प्रदेश मागे पडून डोंगराळ भागा कडे प्रवास सुरू झाला.हिरव्यागार शिवालिक डोंगररागां कडक उन्हात दिलासा देत होत्या.
पिंजोर गार्डन.
मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ,फिदाई खान कोका,सरहिंद प्रदेशाचा नबाब, वास्तुविशारद,याला हिरव्यागार जंगलातली जागा आवडली. त्याने या ठिकाणी पर्शियन "चहारबाग",शैलीत भव्य महाल १६६९ मधे बांधला व त्याचे बाग- ऐ'-फिदाई खान असे नाव दिले.
(चहार बाग शैलीबद्दल मिपाकर "मनो", यांनी विस्तृत माहिती दिली आहे.
https://www.misalpav.com/comment/1129983#comment-1129983)
हे उद्यान १०० एकर क्षेत्रात पसरलेले असून ते उत्तरेकडून दक्षिण दिशेने जाणाऱ्या उतारावर सात टप्प्यावर बांधले आहे.प्रत्येक टप्प्यावर वेगळा महाल आहे.महालांची नावे अनुक्रमे शिश महाल, हवा महल,रंग महल, जल महल, दिवाणे खास, दिवाणे आम आणी सातव्या टप्प्यावर मोठी बाग आहे.महालांच्या मधोमध एक पाण्याचा पाट व त्यामधे थोड्या थोड्या अंतरावर कारंजी आहेत. पर्शियन मुघल शैलीचे मिश्रण आहे.श्रीनगर मधील शालीमार, निशात बागा याच शैलीत बांधल्या आहेत.नैसर्गिक संसाधनांचा भरपूर उपयोग केल्याने महाल सुंदर,अल्हाददायक आहेत.महाल एका सरळ रांगेत आहेत.दोन्ही बाजूस मोठे पामचे वृक्ष आहेत.या वृक्षांवर खुप सारी वटवाघळे उलटी लटकलेली दिसली.अक्षय कुमारचा भूतबंगला या चित्रपटाची आठवण झाली. गार्डनमधे रात्री काय होत असेल याचा विचार करून अंगावर काटा आला.
मुघलांकडून महाराजा रणजित सिह यांनी हा भूभाग जिंकून घेतला. पटियालाचे महाराजा अमर सिंग,महाराजा भूपिंदर सिंग आणि महाराजा यादवेंद्र सिंग या शीख शासकांनी या बागेचे नूतनीकरण आणि विस्तार केला.पटियालाचे शेवटचे शासक महाराजा यादवेंन्द्र सिह यांच्या नावावरून बागेचे नाव बदलून 'यादवेंद्र गार्डन' असे ठेवले. प्रचलित नाव मात्र "पिंजोर गार्डन ", असेच आहे.
गाडी पार्किंगमधे येवून थांबली.समोर महालाचे प्रवेशद्वार,गोल पुष्करणी भोवताली मऊ गवत,फुलांच्या ताटवे,चहूबाजूला भक्कम तटबंदी आणी पूर्वेच्या अंगाला एक मोठी मशीद असे प्रथमदर्शनी दृष्य दिसले.मुलांसाठी पुष्करणी भोवती फिरणारी टाॅय ट्रेन आहे.१९७६ मधे हे उद्यान हरियाणा सरकारने सर्वासाठी खुले केले.प्रवेश शुल्क अगदी नाममात्र आहे. त्या मानाने ऊद्यानाचा रखरखाव अतिशय सुरेख आहे.
-.
उन कडक होते,पर्यटकांचा उत्साहही तेव्हढाच कडक होता.आत गेल्यावर वास्तूची भव्यता लक्षात आली.आम्हीं पहिले दोन महाल बघीतले आणी परत फिरलो.एका महाला पासून दुसर्या महाला पर्यंतचे अंतर किती आहे हे प्रचि बघून वाचकांना अंदाज येईलच. भरदुपारी कडक उन्हात एवढे चालणे शक्य नव्हते आणी गरज वाटली नाही.परत फिरलो. प्रेक्षणीय स्थळांमधे इतिहास,वास्तू कलाकुसर, तांत्रिक गोष्टीं आणी निसर्ग असे बरेच काही बघण्या सारखे असते.यात फार कमी प्रमाणात पर्यटकांना इंटरेस्ट असतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन तोंडे वेंगाडून सेल्फी,फोटो,व्हिडिओ काढणे एवढेच बरेच जण करतात. एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की राॅक आणी पिंजोर गार्डनमधे लैला मजनूनीं आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या दिसल्या नाहीत.कुठेही कोळशाने, तीक्ष्ण शस्त्राने खरडलेले दिसले नाही. त्यामुळे समाधान वाटले.
मुख्य प्रवेशद्वारावर इतर सहप्रवासी येण्याची वाट बघत बसलो. तीथेच हरियाणा पर्यटन विभागाचे छोटेसे कार्यालय दिसले.सहज आत गेलो.एक स्मार्ट जाट तरूण बसला होता. पिंजोरचा इतिहास व आसपास आणखीन काही बघण्यासारखे आहे का म्हणून विचारले. माहिती देताना तो म्हणाला,"मुघल कालीन माहिती नोटीस बोर्डवर दिलि आहे ती तुम्हीं वाचली असेलच.पुढे माहिती देताना म्हणाला,
महाभारत काळात पांडव वनवासी असताना एक वर्ष इथे राहीले होते.त्या काळात भिमेश्र्वर महादेव मंदिर द्रौपदीकुंड, धाराकुंड इ. वास्तू बांधल्या अशी अख्यायीका आहे. तेंव्हा या गावाचे नाव पंचपूरा असे होते.(त्याचा अपभ्रंश पिंजोर झाला असावा. )
आठव्या, नवव्या शतकात पंचपूरा, भीमानगर म्हणून ओळखला जाऊ लागला.प्रतिहार,गुर्जर सम्राटानी राज्य केले.राज्यकर्त्यांनी त्या काळात भीमादेवी मंदिर संकुल पंचायतन शैलीत बांधले.पुढे तेरा ते सतराव्या शतका मधे मुघल राजांनी सर्व मंदिरे क्षतिग्रस्त केली. नबाबाने या भग्न हिंन्दू मंदिराचे कलात्मक दगड महालाच्या बांधकामात वापरले.१९७४ मधे हरियाणा पुरातत्व विभागाने इथे खुदाई काम करून शंभर पेक्षा जास्त मूर्त्या बाहेर काढल्या.
पंचायतन शैलीत बांधलेल्या मंदिर संकुलात मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूस कोपर्यात इतर देवतांची मंदिरे अशी ढोबळ माहिती आहे.सॅण्डस्टोन मधली ही मंदिरे खजुराहो मंदिरांच्या समकालीन असून या ठिकाणाला उत्तर भारता मधले खजुराहो म्हंटले जाते.
( प्रचेतस यावर अधिक प्रकाश टाकू शकतात)
तुम्हीं जास्त माहिती साठी इंटरनेट आणी ASI च्या वेबसाईट बघा असे तो उत्साही तरूण म्हणाला. त्याला भेटून आनंद झाला. धन्यवाद देत बाहेर पडलो.
टुर लिडर लवकर चलण्याची घाई करत होता. अंतर राज्य सिमा नाक्यावर तपासणी साठी वेळच लागणार होता.
काही मिनीटांच्या अंतरावर भिमा देवी मंदिर संकुल जे की आता पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे ते न बघता आल्याने अतिशय चुटपुट लागली.पण"किस्मत ज्यादा आणी समय से पहले कुछ भी नही मिलता",असा विचार करून मनाचे समाधान केले.
आमची मोठी बस पार्किंग मधे दाखल झाली. एक एक पर्यटकांनी आपपाल्या सीटवर बसून घेतले.उन खुप ,पायपीटही भरपूर झालेली. तहानलेल्या जीवानीं बिसलेरीचे घोट भरायला सुरवात केली. नाष्टा तर केंव्हाच जिरला होता.फाड,फाड स्नॅक्सची पाकिटे फोडण्याचा आवाज येवू लागला. ट्रिप मॅनेजरनी, सर्व पर्यटक आल्याची खात्री करून घेतली व पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करण्याचा हुकूम चालकाला दिला. पर्यटक पुन्हा गप्पात रंगले.
मी अंतरजालावर मंदिर संकुलाची माहिती शोधू लागलो. बरीच माहिती मिळाली
चंदिगढ शिमला हे अंतर फक्त एकशे बारा कि. मी.आहे सगळा घाटरस्ता,गती सीमा चाळीस कि.मी.साधारण साडेतीन तासाचा प्रवास,मधे तासभर जेवण्यासाठी व थोडा वेळ चहा पाना साठी जाणार होता.दुपारचे बारा वाजून गेले होते.व्यवस्थित योजनाबद्ध प्रवास झाल्यास पाच वाजेपर्यंत शिमल्याला पोहोचण्याची शक्यता होती.
पिंजोर वरून गाडी निघाली.राष्ट्रीय महामार्ग नंबर पाच, पुढे बावीस,दोनशे पाच अश्या वेगवेगळ्या महामार्गवरून गाडी धावणार होती. चंदीगड → परवाणू → धरमपूर → सोलन → कंडाघाट → शिमला असा प्रवास. महामार्गाचा मेन्टेनन्स,साईन पोस्ट्स, शिस्त वाखाणण्याजोगी आहे.वहाने एका ओळीत शिस्तबद्ध चालली होती. ओव्हरटेक ओव्हरस्पिडिंग करताना अजीबात आढळली नाहीत.अर्थातच,केवळ आणी केवळ घाट रस्ता असल्याने सर्व चालक सजग,सतर्क होते.परिणाम सर्व विदीत असल्याने स्वयंशिस्त पाळत होते. "अती घाई संकटात नेई,लवकर निघा,सुरक्षीत पोहचा,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक",व तत्सम घोषवाक्ये लिहीलेली आढळली नाही. उलट परवाणू सिमावर्ती गावाजवळ हिमाचल प्रदेशात पेट्रोल, डिझेल पंजाब, हरियाणा पेक्षा स्वस्त मिळेल अशीच पाटी लावलेली दिसली.
प्रवास चालू होता. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. महिला मंडळ स्वमग्न होते तर काही पुरूष डुलक्या मारत होते. एका बाजूला डोंगर दुसर्या बाजूला दरी,जागोजागी भूस्खलनाच्या खुणा दिसत होत्या.भूस्खलन थाबवण्या करता सुरक्षा जाळी, कठडे,भिंती बांधणे,शक्य तिथे भराव टाकून रस्ता रुंदीकरण व अन्य सुरक्षा विषयक दुरस्तीची कामे चालू होती.डोंगरांची उंची आणी दरीची खोली वाढत होती.उंचावर जात असल्याचे लक्षात येत होते.खुप दिवसा नंतर निसर्गरम्य वातावरणात प्रवास होत होता.आठवणीतल्या एका कवीतेचे शब्द कानात घोळू लागले.
अल्याड डोंगर,पल्याड डोंगर,
मधेच खोल खोल दरी...
या दरीतून वाहे नदी,
जशी चांदीचीच सरी..."
अगदी असेच दृष्य होते. पंडोह धरणातून बाहेर पडणारे बियास नदीचे (व्यास नदी) पाणी,स्टेप फार्मिंग,डोंगरात वसलेल्या छोट्या टुमदार वस्त्या व घरावर हिरव्या,लाल रंगाची उतरती छप्परे बघून एकंदरीत वातावरण मिपाकर चित्रगुप्त किंवा आमचे चौको भाऊ यांनी कॅनव्हासवर काढलेली निसर्गचित्रे वाटत होती.प्रचि बघून वाचकांच्या लक्षात येईल.
"परवाणू", हरियाणा-हिमाचल प्रदेश सीमेवरचे गाव.इथे वाहनांचे चेकिंग होते.गाडी नाक्यावर थांबली चालक गाडीचे कागद घेऊन ऑफिस मधे गेला.खिडकीतून बाहेर रानमेवा विकणारे लोक दिसत होते.मला जुन्या खंबाटकी घाटाची आठवण आली.जसे तिथे स्ट्राॅबेरी विकणारे तसेच इथे चेरी आणी खुरमानी विकणारे होते. फार गर्दी नसल्याने चेकिंग सोपस्कार लवकर पूर्ण झाले व गाडी पुढे निघाली.
तासाभरा नंतर गाडी धरमपूर गावातील "हाॅटेल हवेली",च्या पार्किंग मधे थांबली दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.गाडी मधे पुन्हा एकदा हलचल तेज झाली. सर्वच जण खडखडले होते. शाकाहारी,सामिष भोजनावर तुटून पडले.गोड पदार्थात गुलाब जाम व मुंग दाल चा हलवा होता.भरपूर जेवण झाले. "आता गाडी सोलन मधे चहा साठी थांबणार आहे असे मधे अजीबात थांबणार नाही. गाडी मधे बसण्या आगोदर वाॅशरूमचा जरूर वापर करा", अशी प्रेमळ सुचना टुर लिडर ने सर्वांना केली.
सामिष, गोड जेवणाने सर्वानाच झिंग चढली. थोड्याच वेळात बऱ्याच जणांची ब्रह्मांनंदी टाळी लागली.मी मात्र बाहेरचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत, कॅमेर्यात, भ्रमणध्वनीवर साठवून ठेवत होतो. गाडी धावत होती,डोंगर, दर्या, गाव मागे पडत होती. वळणावळणाचे रस्ते, वळणावळणावर छातीत धडकी भरत होती.
गाडी आता सोलन जवळ आली. मी जरी सोलन या गावाला पहिल्यांदाच भेट देत असलो तरी या गावाबद्दल खुप सार्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.जसे,मोहन मिकिन्स, सोलन नंबर वन, ओल्ड माॅकं, गोल्डन इगल वगैरे. कायप्पावर मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारल्या.अगदी ऑफिसातले काम सोडून मिपाकर मित्रांनी हिरीरीने गप्पात भाग घेतला.सोलन पासून तीन किलो मीटर पुढे आल्यावर व्हॅली व्ह्यू शाॅपिंग काॅम्प्ल्याक्स समोर गाडी थांबली.डोंगर कड्यावरच्या छोटेखानी हाॅटेल मधून खोल दरीचे रौद्र रूप दिसत होते. सर्वांनीच चहा,समोसा व सेल्फीचा आनंद घेतला.जवळच असलेल्या स्नॅक्स सेंटर मधे फेरफटका मारला. दुकानदारांवर बरोबर डिस्टिलरी बद्दल चौकशी केली. फ्रुट वाईन चाखायला दिली.मग लाजेकाजेस्तव थोडी खरेदी केली.
गाडी पुन्हा शिमल्याकडे धावत निघाली.......
शिमल्याच्या वेशीवर आल्या नंतर गाडी रस्त्या लगत थांबली. इथून पुढे "हाॅटेल इस्ट बाॅर्न", राहाण्याचे ठिकाणा पर्यंतचा प्रवास छोट्या गाडीने झाला. सामान टेम्पो मधे मागाहून आले.
संध्याकाळ झाली होती,हिरण्यकश्यपूचा वध झाला तीच वेळ.उंच देवदार वृक्षांच्या सावल्या घनदाट जंगलात एकमेकात मिसळून गेल्या होत्या.हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर चौकिदार, मॅनेजर,वेटर्स आमच्या स्वागतार्थ उभे होते. रहाण्याचे ठिकाण बघून मन खुश झाले. घनदाट झाडीत लपलेल्या किलबिलाटाने लक्ष वेधून घेतले. सभोवार नजर भिरभिरत असताना समोर ब्ल्यू व्हिसलिंग थ्रश (पहाडी कस्तुरचंद,शिळकरी कस्तूर) आणी स्ट्रिक्ड लाफिंग थ्रश (कशमिरी नाव छोटा पेंगा, स्थानिक नाव शिना पिपाणी,याकूर) हे दोन पक्षी दिसले. प्रवासाचा थकवा निघून गेला....
उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा समजून घेतली व रूम मधे गेलो.रात्रीचा मेन्यू मस्त होता. जेवल्यानंतर निद्रादेवीची अलगद कुशीत घेतले......
-
https://www.misalpav.com/tourism/53715-
पहिला भाग इथे वाचा
उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले..
पुढे.....
रात्री गाढ झोप लागली.नेहमी प्रमाणे सकाळी साडेपाचला आपोआप डोळे उघडले.तयार होऊन खाली आलो. भर वस्तीतले हाॅटेल सिमेंटच्या जंगलाने वेढलेले.साडेसहा वाजले सकाळ होती तरी ही उन कडक व मार्तंड रागात दिसत होता.यावर्षी सर्व ठिकाणी कडक उन्हाळा भासतोय.
एक कवीता आठवली,
वेळ झाली भर माध्यान्ह
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमेजून
माझ्या प्रितीच्या फुला.......
(अवांतर - ही कवीता पुढे याचे अप्रतिम, अजरामर गाणे झाले. कवी रस्त्यावरून जाताना भरदुपारी डांबरीकरण चालू असते व रस्त्यालगत, रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या बाईचे तान्हुले पहुडले होते.त्या बाळा बद्दल आईच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत.)
सकाळी,सकाळी चंदिगढचे तापमान बत्तीस डिग्री होते. आसपास हिरवाई नसल्याने पक्षी नव्हते.कावळे,घारी तेव्हढे दिसत होते. थोडा वेळ थांबलो,चहूबाजूस फेरफटका मारला व नाष्ट्यासाठी प्रयाण केले.आलू पराठे,कवड्या दही, मिक्स लोणचे बरोबर आलू पुडी असे उत्तर भारतीय,पंजाबी पदार्थ होते.उकडलेली अंडी, ऑम्लेट, काॅर्नफ्लेक्स,मोड आलेली धान्ये,फळे इ.होते.हाॅटेल मालक हल्ली ग्राहकांच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असतात.दिक्षित,दिवेकर,खवय्ये सर्वाचा आत्माराम कसा शांत होईल याचा प्रयत्न करतो.आजचा अर्धादिवस चंदिगढ बघण्यासाठी होता. सुखना तळे, राॅक गार्डन व पिंजोर गार्डन ही तीन मुख्य प्रेक्षणीय स्थळे बघण्याचे ठरले. चंदिगढ मधे अजूनही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.जसे कॅपिटल काॅम्प्ल्याक्स (सचिवालय वगैरे) व खरेदी साठी सेक्टर सतरा,रोज गार्डन वगैरे.पर्यटक अवर्जून या ठिकाणी जातात. उरलेला अर्धा दिवस चंदिगढ शिमला प्रवासा साठी होता. चंदिगढ
शिवालीक पर्वतरांगाच्या पायथ्याशी सुनियोजित वसवलेले शहर, भारताचे पहिले पं.प्र. पं जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न. ले कॉर्बुझियर (Le Corbusier )प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद यांनी सन १९५२ मधे डिझाइन केले होते.याबद्दल जालावर भरपूर मााहीती उपलब्ध आहे ती इथे पुन्हा चोप्पपस्ते करत नाही...... उत्तरेकडील सीमावर्ती भागातले अत्याधुनिक प्रमुख शहर. ऐंशी, नव्वदच्या दशकात थंडीमधे होणार्या प्रचंड बर्फबारी मुळे श्रीनगर लेह मार्ग सैन्य आणी नागरी वहातूकीस बंद असायचा. तेंव्हा चंदिगड येथून हवाई मार्गा द्वारे सैनीकांचे आवागमन होत असे.पंजाब व हरियाणा राज्यांची समाईक राजधानी,केंद्रशासीत प्रदेश, मोठी छावणी ,मुख्यालय, चिन व तिबेट यांच्या अंतरराष्ट्रीय सिमा जवळच म्हणून चंदिगढचे महत्व खास आहे.
सामरिक,राजकिय महत्त्वा बरोबरच शहराला ऐतिहासिक, पौराणिक वारसा सुद्धा आहे.महाभारतातमधे "पंचकुला", याचा उल्लेख पंचपुरा म्हणून आढळतो, असे अंतरजालावर समजले.
आमचे रहाण्याचे होटल झिरकापूर गावात, शहराच्या बाहेर असल्याने मुख्य शहराला टाळून छोट्या गाड्यांनी पंचकुला, चंडिमंदिर भागात आलो. व्हि आय पी एरीया,भरपूर हिरवळ, मोठी झाडे,प्रशस्त,स्वच्छ रस्ते व नियंत्रित वहातूक दृष्टीस न पडली तर नवलच. दुचाकीवर चालक आणी सहप्रवासी हेल्मेट घालून फिरताना दिसले. शिख धर्मीय सोडून सर्वजण हेल्मेट वापरताना दिसले.
सुखना तळे
सुखना तळे 'ले कॉर्बुझियर, वास्तुविशारद यांच्या देखरेखी खाली १९५८ मधे बनले. शिवालीक पर्वतरांगा मधून वाहून येणारे पावसाचे पाणी या तळ्यात साठवले जाते.डोंगरा वरून येणारी चिखलमाती, दगड गोटे तळ्यात जमा होऊ नये म्हणून फिल्टरची विशेष व्यवस्था आहे.सुखना तळे शहराची शान आहे. इथले निसर्ग सौंदर्य आणी जैववैविध्य अप्रतिम आहे.
"The Punjab & Haryana high court has declared Sukhna Lake a ‘living entity, or ‘legal person’ with the rights, duties, and liabilities of a living person. Therefore, all the citizens of Chandigarh as loco parentis (in the place of a parent) save the lake". (अंतरजालावरून)
थंडी मधे स्थलांतरीत पक्षी,जसे सायबेरियन बदक,स्टाॅर्क, क्रेन्स या तळ्यावर जरूर मुक्कामाला येतात. जानेवारी ते मार्च या काळात तळे सर्वात जास्त सुंदर दिसते असे स्थानिकांकडून कळाले. तळ्याच्या काठावर सुशोभिकरण करण्यात आले आहे. कमालीची स्वच्छता बाळगण्या साठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जाणवले. सकाळ,संध्याकाळी व्यायाम,विरंगुळ्यासाठी शहरवासीयांना आणी पर्यटकांना ही एक छान जागा आहे. तळ्याचा विस्तार तीन किलोमीटर पर्यंत आहे जणू मुंबईचा मरिन ड्राईव्ह,.....
आम्हीं सकाळी नऊ वाजता तळ्यावर दाखल झालो.उन्हाचे चटके लागत होते.बोटींगची व्यवस्था आहे पण उन्हामुळे पर्यटकानी पाठ फिरवल्या मुळे सर्व जणी तळ्याकाठी नांगर टाकून सुस्तावलेल्या होत्या.स्थानिक लोक,कर्मचारी सोडल्यास इतर लोक नगण्यच होते. पर्यटक झाडाच्या सावलीत उभे राहून सेल्फी, फोटो सेशन करत होते.
मी पक्षी कुठे दिसतात बघत होतो. कडक उन्हामुळे पक्षी सुद्धा जंगलात, झाडांवर निघून गेले होते.ते तळ्यात फक्त हळदी कुंकू बदके (Indian Spot Billed Duck)विहार करताना दिसली. बाकी साळुंक्या पोपट,एखाद दुसरा फुलचुखी पक्षी बागडताना दिसले.
खुप उत्सुकता होती पण पक्षीदर्शन न झाल्याने निराशा झाली. सहा वाजता आलो असतो तर कदाचित जास्त पक्षी दिसले असते. असा विचार चालू असतानाच एक ओळखीचा आवाज कानावर आला.पटकन वर नजर गेली,छोटा धनेशची(Indian Gray Hornbill) जोडी एकमेकाचा पाठलाग करत जंगलाकडे जाताना दिसली. जोडा कॅमेर्यात नाही पण दोघातला एक जण मात्र कॅमेर्यात सापडला.
-
थोडावेळ फिरून झाल्यावर पुढे राॅक गार्डन कडे प्रस्थान करण्याची सुचना आली. आमची पावले पार्किंग कडे वळाली.....
राॅक गार्डन.
साधारण, बाग म्हणले की डोळ्या समोर झाडे,फुले, फुलपाखरे येतात पण दगडांची बाग कशी असेल याची उत्सुकता होती. जगद्विख्यात राॅक गार्डनचे जन्मदाता श्री नेकचंद सैनी,सब डिव्हिजनल इंजिनियर, हे फाळणीपुर्व पाकिस्तानात जन्मले होते .सैनी कुटुंबिय फाळणीनंतर भारतात स्थाईक होण्या साठी ते तत्कालीन पंजाबात स्थलांतरीत झाले. जन्मजात कलेचे वरदान लाभलेले सैनी ,१९५१ मधे रोड इन्स्पेक्टर म्हणून सरकारी कामावर रूजू झाले.काम करताना विवीध टाकाऊ वस्तूंच्या ढिगाऱ्यात त्यानां आपल्या कलेला उपयोगी सामुग्री आणी साकारण्याची क्षमता दिसून आली.
१९५७ मधे श्री नेकचंद सैनी यांनी विवीध आकाराचे छोटे मोठे दगड, फुटक्या टाईल्स, बांगड्यांचे तुकडे,टेराकोटाची फुटकी भांडी,मटके,बाटल्या,इतर औद्योगिक कचरा,विजेचे फ्युज, ट्यूबलाईट चे होल्डर इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून पासून मानवी,प्राणी,पक्षी इत्यादी प्रेक्षणीय कलाकृती बनवण्यास सुरूवात केली.अगदी फेकून दिलेले,कापलेले माणसांचे केस सुद्धा त्यांनी या कलाकृतींच्या डोक्यावर लावण्यासाठी वापरले. अथक अठरा वर्ष श्री सैनी यांनी आपला छंद नेटाने जोपासला. त्यांनी सुखना तळ्याच्या एकाबाजूला जंगलात गुपचूप एक वेगळे अद्भुत साम्राज्य साकारले.
या कलाकृतींचे निर्माण ॲबस्ट्रॅक्ट जरी असले तरी रचनेनुसार ते एका विशिष्ट उद्देशाने बनवलेले दिसते. हे काम, ते सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी मदती शिवाय करत राहीले.
राॅक गार्डन बघताना त्यांची कलासक्ती कल्पनाशक्ती, निष्ठ, प्रेम, सृजनशीलता, दृढनिश्चय पदोपदी दिसून येतो.त्यांनी आपला छंद नोकरी सांभाळून फावल्या वेळात जोपासला.
आज बागेत ५,००० हून अधिक कलाकृती आणि शिल्पे आहेत.हे गार्डन जवळपास 40 एकर मधे पसरलेले आहे. तीन वेगवेगळ्या फेजेस मधे विकसित झालेले हे अद्भुत साम्राज्य चौदा कक्षात (चैंबर) विभागले आहे.(इती वाटाड्या ऊवाच) येथील कलाकृती उंच ओट्यावर प्रस्थापित केल्या आहेत. यात कलाकाराची दुरदृष्टी दिसते.जमीनीवर त्यांना सहज नुकसान पोहचले असते,किंवा त्यांचे वास्तविक सौंदर्य झाकोळून गेले असते.
मानवनिर्मित धबधबे,झोपाळे,पारंपारिक पंजाबी गाव असे अनेक प्रकार अशाच टाकाऊ वस्तूंपासून बनवले आहेत. बाहुल्यांचे संग्रहालय,घुमावदार संकुचित पाऊलवाटा, गल्ल्या(लेन), उंच उंच दगडांच्या भिंती मधून एकमेकांना जोडणारे रस्ते,भव्य कमानी आणी भव्य दालने इत्यादी.
या बाजूला जंगल असल्याने या उपद्व्याप कडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही.कचरा डेपो समजून अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर मधे हा भूखंड अवैध व अतिक्रमित ठरवून त्या सर्व कलाकृती नष्ट करण्या साठी सरकारी हुकूम जारी झाला.जन- सामान्यांच्या भारी विरोधामुळे सरकारला आपला हुकूम मागे घ्यावा लागला, आणी या जागेला सार्वजनिक बागेचे स्वरूप दिले गेले.
आज हे गार्डन शहराचा अभिमान तर आहेच पण श्री नेकचंद सैनी यांची यशोगाथा आहे.देशीविदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
हिंन्दी भाषेत एक म्हण आहे,"अकेला चना भाड नही फोड सकता", म्हणजे "एका हाताने टाळी वाजत नाही."पण जुनून असेल तर अशक्य पण शक्य होते.
"असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।"
या अद्भुत,अनोख्या गार्डनबद्दल किती लिहिले तरी वाचका समोर पुर्ण चित्र उभे करणे मला तरी शक्य नाही.
१९२४ मधे जन्मलेला अवलिया कलाकार २०१५ मधे एक मोठी कलाकृती,सांस्कृतिक धरोहर पाठिमागे सोडून गेला. भारत सरकारने निस्वार्थ कलाकाराच्या कलेचे कौतूक पद्म पुरस्कार देऊन केले. असो, निर्मात्याबद्दल थोडक्यात सांगायचा प्रयत्न होता.
या बागेत फिरणे,कलाकृतींचा अनुभव घेणे त्यांना समजणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. सभोवताली बागेत झाडांवर किलबिलाट चालू होता. उंच आकाशातील पक्षांचे फोटो काढू की कलाकाराच्या जमिनीवरील मोहक अद्भुत कलाकृतींचे ? अशा द्विधा परिस्थितीत सापडलो होतो............."पक्षी इतरत्रही सापडतील, सध्यातरी कलाकृतीवर ध्यान दे.........". असे मनाला समजावले.
भरपूर गर्दी होती. सेल्फिवाले,तूनळीवाले,समूह ,सोलो पर्यटक असे अनेक प्रकारचे,भाषेचे,विवीध वेशभूषा परिधान केलेले सर्व वयाचे पर्यटक आपापल्या पद्धतीने आनंद घेत होते. मी सुद्धा माझ्या कुंटूबासोबत एन्जॉय करत होतो. झाडांचे प्राकृतिक अच्छादन असल्याने चाळीस डिग्री तापमानातही अल्हाददायक वाटत होते. मस्त गारवा होता.
फिरता,फिरता अचानक एक वेगळा आवाज कानावर आला. चमकून वर बघितले तर डोक्यावर एक "पहाडी तांबट",आपल्या साथीदाराला साद घालताना दिसला.
महाराष्ट्र,गुजरात मधील तांबट पक्षी. निकाॅन डि एस एल आर डी ३४००.
" रूप पाहता लोचनी,सुख झाले हो साजणी",
गर्द झाडीत लपलेला तांबट बघताना अशी अवस्था झाली. पटापट फोटो काढले, आवाज रिकाॅर्ड केला.
हिमालयातला दिसलेला पहिला पक्षी. मला पुन्हा एकदा शहारूख खानचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवला,
"किसी चिज को शिद्द्त से चाहो तो.....सारी कायनात.....ब्ला, ब्ला, ब्ला".
मी याला थोडे माॅडिफाय केले,
"तुम किसी पंछी को मुद्दाम चाहो तो वो आपके कानमे आ के बोलता है!" "मै यहाँ हू....,मै यहाँ हू....,मै यहाँ हू......"
ग्रेट बार्बेट,पहाडी तांबट' असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Psilopogon virens आहे.मोठा आशियाई बार्बेट पक्षी, प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. अतिशय सुरेख,रंगबिरंगी पक्षी.प्रकृतीचे जवळपास सारे रंग याच्यात दिसतात.आपल्या कडे आढळणारा तांबट (काॅपरस्मिथ बार्बेट) सुद्धा सुरेख आहे पण एव्हढा नाही.
रूप ग्रेट बार्बेटचे!
आखूड मान,मोठे डोके,जणू रंगपेटीचे खोके!
मोठ्या पिवळ्या चोचीवर झुपकेदार मिशा,
निळे पाणीदार डोळे,याला खुल्या दाही दिशा!
पाठीवर साजिरा,मखमली तपकिरी कोट,
हिरव्या-पिवळ्या छटांनी,सजले सुंदर पोट!
बुडावर घातला याने लाल चुटुक डायपर,
भिरभिर,तीक्ष्ण नजर,जसा चारचाकीचा वायपर!
'पिल-हॉ... पिल-हॉ...', गुंजे डोंगर-दरा,
झाडांच्या पानांआड दडे, वनराणीचा तुरा!
मुक्तहस्त चित्राचा पिसारा हिरवागार,
ग्रेट बार्बेट,निसर्गाचा अद्भुत अविष्कार!
राॅक गार्डन बघण्यासाठी शुल्क मात्र वीस रुपये आहे.इतर सर्वजनिक उद्यना प्रमाणेच पार्किंग, स्नॅक्स, प्रसाधन रूम इत्थंभूत सोयी आहेत.
आम्हांला आता पिंजोर गार्डन कडे प्रस्थान करायचे होते........
बाकी पुढच्या भागात.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.