बडोदे नगरी :- प्राप्य
ऐतिहासिक साधनानुसार बडोद्याचा इतिहास २००० वर्षापर्यंत मागे नेता येतो,
अंकोटक (सध्याचे अकोटा ) ह्याच्या पूर्वेला असलेली हि मुळात व्यापारी
लोकांनी वसवलेली छोटीशी वसाहत. आजूबाजूला वडाची भरपूर झाडे असल्याने नाव
पडले वटपत्रक!! कालांतराने ह्या नावात वटपत्रक- वतपत्तन - वटोदर- बडोदे-
वडोदरा असे बदल होऊन आजचे वडोदरा अस्तित्वात आले . वडोदरा हा संस्कृत शब्द
आहे, ज्याचा अर्थ वटवृक्ष होतो.राजपुत राजानंतर राजा चंदन याने वडोदरा
जिंकून घेतले. सुरवातील जैन शासकांनी याचे नाव चंदनवती ठेवले मात्र नंतर
वडोदरा असे केले गेले. दहाव्या शतकात गुप्त आणि चालुक्य राजवटींच्या भाग
असलेल्या बडोद्यावर काही काळ सोळंकी राजे आणि त्यानंतर मोगलांनी प्रदीर्घ
काळ शासन केले, या राजवटींच्या खुणा आजही बडोद्यात ठिकठिकाणी दिसू शकतात.
१६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर
अखेर १७२१ साली मराठ्यांना येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१
साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले.आता याच बडोदे
संस्थानाविषयी जाणून घेउया.
ब्रिटिशांकित भारतातील गुजरातमधील एक प्रसिद्ध व प्रगत संस्थान.
क्षेत्रफळ सु. २०,७४० चौ. किमी, संस्थानचा प्रदेश सलग नसून गुजरात –
काठेवाडातील इतर देशी संस्थाने आणि ब्रिटिश जिल्हे यांतून विखुरलेला होता.
उत्तरेस कडी (मेहसाणा), मध्यावर पण नर्मदेच्या उत्तरेस बडोदे, , दक्षिणेस
तापी नदीजवळ नवसारी हे प्रांत गुजरातेत तर अमरेली आणि ओखामंडल हा छोटा
जिल्हा काठेवाडात विभागलेले होते. संस्थानात लहानमोठी ४८ शहरे असून ३,०३५
खेडी होती. संस्थानची स्थापना करणाऱ्या गायकवाडांचा मूळ पुरुष दमाजी.
त्याने गुजरातेत स्वाऱ्या करणाऱ्या सेनापती खंडेराव दाभाड्यांच्या हाताखाली
मर्दुमकी गाजवून ‘समशेर बहादूर’ हा किताब मिळवला. त्याच्या मृत्यूनंतर
पुतण्या पिलाजी (कार. १७२१-३२) याने सोनगड हे मुख्य ठाणे करून सुरत, बडोदे,
नांदोद, चांपानेर, भडोच इ. प्रदेशांवर अंमल बसविला. डभईच्या लढाईत (१७३१)
त्रिंबकराव दाभाडे मारले गेले पण पेशवा पहिल्या बाजीरावाने पिलाजीला
‘सेनाखासखेल’ हा किताब देऊन दाभाड्यांऐवजी त्याचे गुजरातेतील हक्क मान्य
केले. मोगल सुभेदार अभयसिंगने एका मारवाड्याकडून पिलाजीचा डाकोरला खून
करविला (१७३२) आणि शेरखानबाबी याच्याकडे बडोद्याचे राज्यपालपद दिले (१७३२).
पिलाजीचा मुलगा दुसरा दमाजी गायकवाड (कार. १७३२-६८) याने बडोदे पुन्हा
जिंकले (१७३४). गुजरातखेरीज काठेवाड-माळ्व्यापर्यंत त्याने स्वाऱ्या
केल्या. पिलाजी-दमाजी या बारलेकांनी मोगल सुभेदारांप्रमाणेच कंठाजी
कदमबांडे आदी स्वकीयांशी मुकाबला करुन गुजरातेत गायकवाडांच्या सत्तेचा पाया
घातला. कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईचा नंतर पक्ष घेणाऱ्या दमाजीला
बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशव्याने काही काळ कैद केले (१७५१) पण मागील बाकी
१५ लाख रु. द्यावी, १०,००० घोडदळ पेशवे म्हणतील तेव्हा लष्करी कामगिरीसाठी
सज्ज ठेवावे, सुरत अठ्ठाविशी, मही, रेवाकांठा वगैरे भागांतील २८ लाखांचा व
काठेवाडातील तीन लाखांचा प्रदेश स्वतःकडे ठेवावा, उरलेला प्रदेश व नवीन
जिंकलेल्या प्रदेशाचे निम्मे उत्पन्न पेशव्यांना द्यावे इ. अटींवर सुटका
केली (१७५४). पुढील वर्षी त्याने व रघुनाथरावाने अहमदाबादवर अंमल बसविला.
दमाजीने आपले ठाणे पाटणला हलविले (१७६२). त्यानंतर बडोदे हीच गायकवाडांची
राजधानी झाली. थोरल्या माधवरावाविरुद्ध रघुनाथरावाला मदत करण्यासाठी त्याने
दुसरा मुलगा गोविंदराव याला पाठविले पण तो पेशव्यांच्या कैदेत पडला
(१७६८). गोविंदरावाने बरीच मोठी खंडणी वगैरे अटी मान्य करुन सेनाखासखेल हा
किताब मिळविला पण १७७१ मध्ये दमाजीचा थोरला मुलगा सयाजी याला ते पद देउन
धाकटा मुलगा फत्तेसिंग याला त्याचा मुतालिक नेमण्यात आले. पुढील सहासात
वर्षे गोविंदराव-फत्तेसिंग यांत अंतःकलह माजून अखेर फत्तेसिंग विजयी झाला
(१७७८). याच काळात फत्तेसिंग-रघुनाथराव-इंग्रज युती होऊन इंग्रजांनी भडोचवर
हक्क मिळविले व गायकवाडीत शिरकाव केला. इंग्रजांच्या तहाचा (१७८०)
फत्तेसिंगाला फायदा झाला नाही. त्याच्या मृत्युनंतर (१७८९) सत्ता हस्तगत
करण्यासाठी गोविंदरावाला (कार. १७८९-१८००) मानाजी, मल्हारराव हे भाऊबंद,
पेशव्यांचा अधिकारी आबा शेलूकर इत्यादींविरुद्ध कारवाया कराव्या लागल्या.
दुर्बल पेशव्याने अहमदाबादचा मक्ता (इजारा) १८०० मध्ये गायकवाडांना दिला पण
आनंदरावाने (कार. १८००-१८१९) अरब तसेच मल्हारराव, कान्होजी या भाऊबंदांचा
पुंडावा मोडण्यासाठी इंग्रजांची तैनाती फौज मान्य केली (१८०२). त्यासाठी
७०,००० रुपयांचा प्रदेश इंग्रजाना तोडून दिला आणि सौराष्ट्रातील खंडणी
आपल्यातर्फे वसूल करण्याचे हक्क त्यांना दिले. सहाजिकच संस्थान अशा रीतीने
इंग्रजांच्या मांडलिकीखाली आले. पेशवे-गायकवाड यांचा आपसातील हिशोब
मिटविण्यासाठी गेलेले बडोद्याचे मुत्सद्दी गंगाधरशास्त्री पटवर्धन यांचा
पंढरपूर येथे खून झाला (१८१५). पेशवाईच्या अस्तानंतर त्यांचा गुजरातेतील
उत्पन्नाचा हिस्सा गायकवाड इंग्रजांना देऊ लागले. शिवाय इंग्रजांची तैनाती
फौज वाढली. पहिल्या सयाजीरावांच्या काळी (कार. १८१९-४७) इंग्रजाचे प्रभुत्व
पूर्णपणे स्थापन झाले. इंग्रजानी महीकांठा येथील खंडणी वसुलीही स्वतःकडे
घेतली आणि तैनाती फौजेच्या दिमतीसाठी घेतलेला २० लाखांचा प्रदेश परत केला
पण लाचखाऊ अधिकाऱ्यांनी अंतर्गत काभारात ढवळाढवळ केली, तेव्हा इंग्रजांनी
पेटलाद शहर व आसपासचा भाग कायमचा घेतला (१८३८). संस्थानात गुलामगिरी अवैध
ठरली. गणपतराव (कार. १८४७-५६) यांनी दळणवळणात सुधारणा केल्या आणि
भ्रूणहत्येवर बंदी घातली. खंडेरावांच्या कारकीर्दीत (१८५६-७०) मियागाव ते
डभई रेल्वे झाली त्यांनी सरकारी पतपेढ्या काढल्या व जमिनीच्या पाहणीला
सुरुवात केली तसेच मल्लविद्येला उत्तेजन दिले. महीकांठा-रेवाकांठा यांमधील
वाघऱ्यांची बंडे मोडून १८५७ मध्ये इंग्रजांना मदत केल्याबद्दल शिबंदीचा
सालीना तीन लाख रूपये खर्च माफ झाला. खंडेरावांचा कैदेत असलेला भाऊ
मल्हारराव हा नंतर गादीवर आला पण त्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी
समिती नेमावी लागली. दिवाण दादाभाई नवरोजीसुद्धा मल्हारावाला मदत करु शकले
नाहीत. त्यांनी राजीनामा दिला. रेसिडंट कर्नल फेयरला विष घातल्याचा आरोप
मल्हाररावावर आला. या आरोपाच्या चौकशी समितीत ३ युरोपीय व ३ भारतीय सदस्य
होते. तिन्ही भारतीयांनी मल्हाररावांना निर्दोषी ठरविले तरी त्यांना
पदच्युत करण्यात आले (१८७५).
खंडेरावांची विधवा पत्नी जमनाबाई हिने दत्तक घेतलेल्या तिसऱ्या
सयाजीरावांची प्रदीर्घ कारकीर्द (१८७५-१९३९) संस्थानाचे सुवर्णयुग ठरली.
वयात येऊन त्यांना पूर्णाधिकार मिळेपर्यंत (१८८१)
प्लेग-दुष्काळ-महापुरासारख्या आपत्तीही आल्या पण शासनाच्या अंगोपांगांत
जातीने लक्ष घालून राजा सर टी. माधवराव, मनूभाई मेहता, व्ही. टी.
कृष्णम्माचारी इ. दिवाणांच्या साहाय्याने सयादीरावांनी संस्थानाला अत्यंत
प्रगत, आधुनिक आणि संपन्न केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केलेच
(१९०६) तसेच मागासलेल्या जमाती, स्त्रियांचे शिक्षण, कृषी व तांत्रिक
शिक्षण, ललितकला अशा सर्व क्षेत्रांत सोयी उपलब्ध केल्या आणि शेती व
उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. प्राच्यविद्या, भारतीय भाषा, ग्रंथालये,
ग्रंथनिर्मिती, साहित्यपरिषदा व इतर अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था या
सर्वांना त्यानी सढळ हाताने अनुदाने देऊन उत्तेजन दिले. महाराजा सयाजीराव
विद्यापीठ हे त्याचेच एक महत्वाचे फलित होय. पंचायतींचा कायदा करून (१९०६)
दहा हजार वस्तीवरील प्रत्येक शहरात नगरपालिका स्थापन केली आणि शहराच्या
सुखसोयीत व सौंदर्यात भर घातली. हा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर नातू
प्रतापसिंह (कार. १९३९-५१) यांना सांभाळता आला नाही. सीतादेवी या घटस्फोट
झालेल्या – धर्मांतरित स्त्रीशी विवाह करण्यासाठी-संस्थानचा
द्विभार्याप्रतिबंधक कायदा त्यांनी दुरुस्त करुन घेतला आणि स्वतःचा तनखा २३
लाखांवरुन ५० लाख केला त्यामुळेच त्यांना १९५१ मध्ये पदच्युत करण्यात आले.
१९४७ मध्ये संस्थान विलीन करण्यास संमती दिल्यावर आपणास गुजरातचा राजा
करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. प्रजामंडळा च्या दडपणामुळे १९४८ मध्ये
त्यांना ५८ सदस्यांची घटनासमिती तथा लोकनियुक्त विधिमंडळ स्थापावे लागले
आणि जीवराज मेहता हे मुख्यमंत्री झाले. १ मे १९४९ रोजी संस्थान मुंबई
राज्यात विलीन झाले व १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा भाग बनले.
Ⓘ बडोदा संस्थान
संस्थानच्या प्रशासनासाठी महाराजांच्या अध्यक्षत्वाखाली दिवाण, अमात्य व
इतर तीन सदस्य अशी पाचजणांची कार्यकारणी असे. कार्यकारिणीचे सदस्य महसूल,
अर्थ, शेती इ. महत्वाच्या खात्यांचे प्रमुख असत. त्याखेरीज सार्वजनिक
बांधकामे, आरोग्य, शिक्षण, पोलीस, कारागृहे, न्याय, सेना, अभिलेख, राजवाडा
अशी इतरही महत्वाची खाती असत. चार प्रांतांपैकी प्रत्येक प्रांतावर सुभेदार
हा मुख्य व त्याच्या खाली नायबसुभेदार हा अधिकारी असे. तालुक्याच्या
मुख्याला वहिवाटदार म्हणत. एक हजारावर लोकसंख्या असलेल्या प्रत्येक खेड्यात
ग्रामपंचायत असे. त्यातील ५ सदस्य लोकनियुक्त व ५ सरकारीनियुक्त असून,
पंचायतींना बरेच अधिकार दिले होते. जिल्हे व तालुके यांच्या विकासासाठी ८
ते १६ सदस्य असलेल्या जिल्हा व तालुका परिषदा होत्या. जिल्हा परिषदेचा
सुभेदार व तालुका परिषदेचा नायबसुभेदार अध्यक्ष असे. त्यांतील निम्मे सदस्य
लोकनियुक्त असत. आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकामे परिषदांकडे होती,
न्याय व अंमलबजावणी यांत फारकत होती. कायदे करण्यासाठी धारासभा होती.तिच्या
२५ सदस्यांपैकी १० लोकनियुक्त असत कायदे महाराजांच्या संमतीने तयार होत.
न्यायदानासाठी प्रत्येक तालुक्यात व काही खेड्यांतूनही मुन्सिफ असे.
आरोग्यासंबंधीचे किरकोळ खटले गावचा पाटील चालवी. पाच रुपयापर्यंत दंड, ४८
तासापर्यंत कैद अशी शिक्षा देण्याचा पाटलाला अधिकार होता. प्रांत न्यायाधीश
मृत्युदंड देऊ शकत असे पण त्यासाठी महाराजांची संमती लागे. सर्वोच्च
न्यायालय बडोद्याला होते.त्यात मुख्य न्यायाधीशाखेरीज इतर तीन न्यायाधीश
असत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील अपील महाराजांकडे जाई व त्याचा
निकाल तीन सदस्यांच्या हुजूर न्यायसभेच्या सल्ल्याने महाराज करीत.
सरदार-दरकदारांसाठी वेगळे सरदार न्यायालय होते सरकारी खात्यासंबंधीच्या
तक्रारींची चौकशी सदर अदालत करी. शेतजमिनीच्या वाटण्या व गहाण यांवर
नियंत्रण होते. शेतविषयक माहितीसाठी खेडूत पंचांग निघे. गरिबांना रोज
धर्मादाय खिचडी वाटली जाई. संस्थानात सु. ४५० सहकारी व २,५०० वर शैक्षणिक
संस्था होत्या. एकचतुर्थांश लोकलफंड दुष्काळनिवारणासाठी राखीव होता.
संस्थानात ५ वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. खेडोपाडी वाचनालये असत. बालविवाहावर
बंदी असून विधवाविवाहास उत्तेजन देण्यात येई. संस्थानाचा स्वत:चा ७९५ मैल
लोहमार्ग होता. डाकतारखाते इंग्रजांकडे असून संस्थानात पूर्वीच्या बाबाशाही
रुपया ऐवजी १९०१ पासून इंग्रजी नाणी प्रचारात आली. संस्थानचे ५,००० कवायती
व जवळजवळ तितकेच बिनकवायती सैन्य होते. महाराजांना २१ तोफांच्या सलामीचा
मान होता.
बडोद्याचा कायापालट करणारे पुण्यश्लोक श्रीमंत महाराजा
सयाजी राव गायकवाड तिसरे, यांचे एक स्वप्न होते की बडोदे शहर एक शैक्षणिक,
औद्योगिक व व्यापारी केंद्र बनावे, आणि त्यांनी आपले स्वप्न सत्यात
येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज अहमदाबाद आणि सूरत नंतर बडोदा हे
पश्चिम भारतातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. वडोदरा हे जिल्ह्याचे
प्रशासकीय केंद्र आहे आणि राजधानी गांधीनगर येथून 139 कि.मी. (86 मैल)
विश्वामित्री नदीच्या काठावर स्थित आहे.
-> लोक आणि संस्कृती
बडोदा भारतातील महानगरीय शहरांपैकी एक आहे.गायकवाड राजवटीत कला साहित्य
स्थापत्य यांना मिळालेला उदार राजाश्रय आणि नंतरच्या काळातील औद्योगिकीकरण,
शैक्षणिक विकास यामुळे बडोदा एक विकसनशील शहर बनले आहे . संपूर्ण जगभरातून
तसेच देशातून विविध प्रकारचे लोक बडोद्याला नेहमी भेट देत असतात. येथे
गुजराती, उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात.
महाराष्ट्राबाहेर बहुसंख्य मराठी लोकवस्ती असणारे बडोदे हे बहुधा एकमेव शहर
असावे. समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा सांगणारे बडोदे , गुजराथ
ची "संस्कार नगरी" म्हणून प्रसिद्ध आहे. दिवाळी, मकरसंक्रांती , होळी,
गुढी पाडवा आणि गणेश चतुर्थी हे उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
संपूर्ण देशात नवरात्रातील गरबा नृत्यासाठी वडोदरा प्रसिद्ध आहे.
मकरसंक्रांतीच्या पतंगबाजी आणि आतिषबाजीसाठी बडोदा प्रसिद्ध आहे .. -> शिक्षण आणि साहित्य
शिक्षण आणि साहित्य दोन्हीमध्ये बडोद्याच्या लक्षणीय प्रगती केलेली आहे
.”महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा” हे विद्यापीठ, गुजरातमधील सर्वात
मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठातील “हंसा मेहता वाचनालय” हे आशिया खंडातील
सर्व विद्यापीठात सर्वात मोठे वाचनालय आहे. महाराष्ट्र शारदेची सेवा
करणाऱ्या किती तरी साहित्यिकांचा संबंध बडोद्याशी आला आहे, राजकवी यशवंत ,
माधव ज्युलियन, ची वि जोशी, हि काही ठळक नावे. साहित्य प्रेमी लोकांसाठी येथे वडोदरा मध्यवर्ती वाचनालय , जयसिंहराव वाचनालय , प्राच्यविद्या मंदिर या सारखी ठिकाणे आहेत. -> कला आणि स्थापत्य
वडोदरा आपल्या कला आणि स्थापत्यासाठी देखील ओळखले जाते. गायकवाड राजवटीत
कला साहित्य स्थापत्य यांस उदार राजाश्रय मिळाल्याने बडोद्यास “ कला नगरी'
असेही म्हटले जाते..प्रेक्षणीय स्थळांमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा
संग्रहालय आणि चित्र गॅलरी, सयाजी बाग ,महाराजा सयाजीराव विद्यापीठ, कीर्ती
मंदिर, किर्ती स्तम्भ, न्याय मंदिर, खंडेराव बाजार, अरबिंदो आश्रम, ईएमई
मंदिर (दक्षिणामूर्ती मंदिर), हजिरा मकबरा, काळा घोडा, मैराळ गणपती मंदिर,
भद्र कचेरी, चार दरवाजा, सुरसागर तलाव, इत्यादी ऐतिहासिक स्थळे आहेत. कला रसिकांसाठी प्रख्यात म्युजिक कॉलेज, फाईन आर्ट्स कॉलेज इत्यादी आवर्जून भेट देण्यासारख्या संस्था आहेत. -> उद्योग आणि अर्थव्यवस्था
पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र
हे या शहराचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्व आहे. प्रमुख उद्योगांमध्ये
पेट्रोकेमिकल्स, अभियांत्रिकी, रसायने, औषधी, प्लास्टिक, आयटी आणि विदेशी
विनिमय सेवा यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच खाजगी
क्षेत्रातील इतर मोठ्या प्रमाणावरील उद्योगांची संख्या पण वाढली आहे.
विविध प्रकारच्या बँकिंग तसेच आर्थिक सेवा पुरविणाऱ्या अनेक संस्था
बडोद्यात कार्यरत आहे. -> वाहतूक
रोड कनेक्टीव्हीटीसाठी नवे रस्ते, उड्डाणपूल झाले आहेत. वडोदरा जंक्शन
रेल्वे स्थानकावरून प्रवाशी जवळजवळ सर्वच भागांमध्ये प्रवास करू शकतात.
वडोदरामध्ये मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगलोर
यांच्याकडे फ्लाइट कनेक्शन आहेत. वडोदरा विमानतळ येथे ऑक्टोबर 2016 एक नवीन
एकीकृत आंतर्राष्ट्रीय टर्मिनल बांधण्यात आले. वडोदरा हे गुजरात मधील
पहिले ग्रीन विमानतळ आणि कोचीनंतर भारतातले दुसरे ग्रीन विमानतळ आहे.
दिल्ली आणि गांधीनगरला अहमदाबादपासून सुरत आणि मुंबईला जोडणारा नॅशनल हायवे
8, बडोदे शहरातून जातो . शहरात सार्वजनिक वाहतूक- बस, रिक्षा आणि टॅक्सी
सेवा सहज उपलब्ध आहेत.
गुजरातमधील सुप्रसिध्द पदार्थ :-
गुजरातमधील एक महत्वाचे शहर असल्यामुळे खाण्यापिण्याची येथे चंगळ
होते.अर्थातच गुजराती पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात.मात्र नॉन
व्हे़जपेक्षा शाकाहारी हॉटेल मोठ्या संख्येने असल्यामुळे शुध्द शाकाहार
करण्यार्या लोकांची अडचण होत नाही.इथे गुजराती पदार्थांंमध्ये मोठे
वैविध्य उपलब्ध असते.स्ट्रीट फुड अर्थात रस्त्यावर उपलब्ध असणार्या
पदार्थामध्येही खुप प्रकार मिळतात. यामध्ये शेव उसळ, वडापाव, फरसाण,
दाभेली, पोहे, कचोरी,फाफडा-जिलेबी, पावभाजी,लस्सी,सँडवीच, चायनीज, मेक्सीकन
फुड इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
वडोदर्याला जाण्यासाठी योग्य काळ :-
वडोदरा शहराचे पर्यटन करण्यासाठी सर्वात योग्य कालावधी हिवाळा ऋतु हाच
आहे.इथे थंडी सुखद असते.तापमान साधारण १६ डिग्री सेल्सिअसच्या आसपास
असते.याशिवाय ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी फिरण्यासाठी योग्य मानता
येईल.याच काळात येणारे पर्यटक इथल्या नवरात्र उत्सवात सहभागी होउ
शकतात.मात्र उन्हाळ्यात वडोदर्याला येण्याचा चुकूनही विचार करु
नका.त्याकाळात इथले तापमान जवळपास ४२ अंश डिग्री से.असते.
वडोदर्याला जायचे कसे ?
१) हवाईमार्गे :-
वडोदरा शहरात एक विमानतळ आहे.सध्या तरी इथून देशांतर्गत विमानसेवा सुरु
आहे.भारतातील प्रमुख शहरात थेट विमानसेवा असल्यामुळे वडोदर्याला
विमानमार्गे सोपे आहे.मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी जवळचा
आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद हा आहे.अहमदाबादचा सरदार वल्लभभाई पटेल
आंतरराष्ट्रीय विमानतळ १०० कि.मी.दुर आहे.
रस्त्याने :-
रस्तामार्गे वडोदर्याला जाणे सोपे आहे.राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाने
वडोदरा गुजरातच्या इतर भागांना उत्तम प्रकारे जोडले गेले आहे. वड़ोदरा
जंक्शन जवळील एसटीसी बस स्टेशन नियमित वरुन बस सेवा आहे.इथून गुजरातमधील
इतर भागांना तसेच महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि राजस्थानला जाणार्या थेट बस
सेवा आहेत.
रेल्वेने :-
वडोदरा जंक्शन भारतातील एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे.गुजरातमधील एक
महत्वाचे रेल्वे स्टेशन म्हणजे वडोदरा. शताब्दी आणि राजधानी
एक्सप्रेससारख्या प्रिमीयम रेल्वेगाड्या वडोदरा ते दिल्ली व मुंबई अशा
धावतात.
जलमार्गाने :-
सावली गावातून माही नदीतून बोटीने वडोदर्याला पोहचता येते.
वडोदर्यातील स्थानिक वहातुक व्यवस्था :-
इथे सिटीबस आणि ऑटो रिक्क्षा यांची सोयीस्कर आणि स्वस्त सेवा असल्यामुळे
वडोदर्यात फिरणे सोयीचे आहे.रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या VITCOS बस
स्टैंड पासून सिटीबस सर्वत्र जातात.
विश्वामित्री
नदीच्या किनार्यावर वसलेल्या वडोदर्याला कलानगरी मानले जाते.इथे भव्य
महाल, संग्रहालय, बगीचे, मंदिर्,बाजार बघण्यासारखे आहेत. पर्यटनाचा विचार
केला तर बडोदा आपल्याला कधीच निराश करत नाही. वडोदरा आणि परिसर फिरायला
आलात तर पुरेसा वेळ हाताशी असु द्या.कारण शहर आणि परोसरात खुप काही
पहाण्यासारखे आहे.वडोदरा शहर आणि परिसरात भरपुर पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये
लक्ष्मी विलास महाल, नजरबाग महाल, मकरपुरा महाल, श्री अरविंदो निवास,
अंकोत्तका, सयाजी बाग, सुरसागर तलाव, दभोई आणि छोटा उदयपुर हि प्रमुख
ठिकाणे आहेत. याशिवाय कडिया डुंगर येथे लेणी आहेत.वन्यजीव प्रेमींसाठी
वधवाना वेटलैंड अँड ईको कँपसाइट आहे जिथे आपण परदेशातून आलेले पक्षी बघु
शकतो. याशिवाय जवळच असलेल्या सांखेडा या गावी फर्निचर आणि इतर वस्तु तयार
होताना बघू शकतो आणि खरेदी करु शकतो.
लक्ष्मी विलास पॅलेस :-
भारतातील
सुंदर राजवाड्यापैकी एक म्हणजे हा लक्ष्मी विलास पॅलेस.वडोदर्याच्या
राजघराण्याचा इथे निवास आहे.वडोदर्याचे राजे गायकवाड घराण्याचे हे
निवासस्थान. इ.स. १८९० मध्ये सयाजीराव गायकवाड ( तिसरे ) यांनी निर्माण
केलेला हा राजमहाल एखादे खाजगी निवासस्थान म्हणून सर्वात मोठे आहे.लंडनच्या
बर्किंगहॅम पॅलेसच्या आकारमानाच्या चौपट हा राजवाडा आहे.याची वास्तुशैली
इंडो-सारसेनिक आहे.वडोदर्यातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण म्हणजे हा
राजवाडा.इथला दरबार हॉल्,सिंहासन्,मोती बाग पॅलेस आणि महाराजा फत्तेसिंग
संग्रहालय हि प्रेक्षणीय स्थळे आहेत.
या
राजवाड्याच्या परिसरात आपण मोर बघु शकतो. तसेच एक गोल्फ कोर्सदेखील
परिसरात आहे. या राजवाड्याचे आर्किटेक्ट मेजर चार्ल्स माँट होते.त्यांनी
डिझाईन केलेली हि वास्तु उभारण्यासाठी बारा वर्ष लागली तर बांधकामाचा खर्च £
180,000 आला. मुख्य राजवाड्याच्या आत अनेक इमारती जश्या मोतीबाग पैलेस आणि
महाराजा फतेह सिंह संग्रहालय भवन आहे.हि संग्रहालयाची इमारत राजघराण्यातील
सदस्यांची शाळा म्हणून उभारली गेली.या वास्तुच्या उभारणीत स्थानिक कारागिर
तसेच विदेशी कलाकार होते.त्यामुळे एक वास्तुरचनेचे मिश्रण होउन हि देखणी
इमारत उभी राहिली. या वास्तुच्या उभारणीच्या वेळी आग्र्याहून लाल
दगड्,पुण्याहून निळे दगड तर राजस्थान आणि इटलीवरुन विशेष दगड मागवले गेले.
हा राजवाडा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना बघण्यासाठी
खुला असतो.तर सोमवार व इतर सरकारी सुट्ट्यांना बंद असतो. इथली प्रवेश फि
प्रति व्यक्ती १५०/- आहे.
प्रताप विलास पॅलेस :-
प्रताप
विलास पॅलेस हा स्थापत्य कलेचा अतिशय आकर्षक आणि सुंदर नमूना आहे. या
महालात संगमरवर आणि टेराकोटापासून तयार केलेल्या शिल्पाकृती आहेत. तसेच
प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील येथे आहे.
मकरपुरा पॅलेस :-
उन्हाळ्याच्या कालावधीत राजपरिवाराला रहाण्यासाठी मकरपुरा पॅलेसची उभारणी
करण्यात आली. इ.स. १८७० मध्ये याची उभारणी करण्यात आली.महाराजा खंडेराव
यांनी याची उभारणी केली.याच्या वास्तुरचतेन इटालियन शैली वापरण्यात
आली.सुरवातीला बडोद्याचे राजघराणे उष्माकाळात तामिलनाडुतील निलगिरी
पर्वतावर असलेल्या निवासस्थानात रहायला जात असल्यामुळे याचा फार वापर होत
नव्हता.,मात्र या वास्तुची पुढे पुर्निमिती केली गेली.सध्या मात्र या
महालाचा वापर भारतीय वायु सेनेकडून प्रक्षिशण शाळा म्हणून केला जातो. याला
१७ टेट्रा स्कुल असे सध्या म्हणले जाते.सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६
वाजेपर्यंत हा पॅलेस पर्यटकांसाठी खुला असतो.
महाराजा फतेहसिंह संग्रहालय:-
राजघराण्यातील मुलांसाठी शाळा म्हणूनच या राजवाड्याची निर्मिती करण्यात
आली. सध्या इथे महाराज फत्तेसिंग यांच्या संग्रहातील वस्तुंचे प्रदर्शन
आहे.यामध्ये शाही परिवाराची चित्र, हिंदु पुराणकथांवर आधारीत चित्र आणि
संगमरवर व काश्यात बनवलेल्या मुर्तींचा खजिना आहे.
वडोदरा म्यूझियम आणि आर्ट गॅलेरी :-
वडोदर्याला सयाजीबागेत जी दोन वस्तुसंग्रहालये आहेत त्यातील एक हे वडोदरा
म्युझीयम. याची निर्मिती महाराजा सयाजीराव तृतीय यांच्या मार्गदर्शनाखाली
मेजर चार्ल्स मंट आणि आरएफ चिसोल्म यांनी 1894 मध्ये केली.या संग्रहालयाची
उभारणी लंडनच्या विज्ञान संग्रहालय आणि विक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय
यांना डोळ्यासमोर ठेवून केली गेली. या वस्तुसंग्रहालयात मोघल चित्रकारीचे
नमुने जपान्,नेपाळ आणि रशियातील मुर्ती यांचा संग्रह आहे.जगभरातील
नाण्यांचा मोठा संग्रह इथे आहे.विवीध भारतीय संगीत वाद्य, विवीध यंत्र,
युरोपातील राजेरजवाडे यांची चित्र ,महाराजा सयाजीराव गायकवाड़ ( तिसरे )
यांच्या वैयक्तिक संग्रहातील वस्तु , निळ्या देवमाशाचा सांगाडा, इजिप्तमधील
ममी, याशिवाय भुविज्ञान्,इतिहास्,भुगोल,
भुगर्भशास्त्र,मानववंश्शास्त्र्,पुरातत्वशास्त्र यांच्याशी संबधीत उपकरणे
यांचे इथे प्रदर्शन आहे. वडोदरा संग्रहालयाच्या वेळा:- सोमवार – शुक्रवार: सकाळी 9.30 – संध्याकाळी 6.00 शनिवार – रविवार: सकाळी 9.30 – संध्याकाळी 6.00 इथे भारतीय नागरिकांसाठी प्रवेश फि १०/- तर परदेशी नागरिकांसाठी प्रवेश फि - २००/- आहे.
सयाजी गार्डन, वडोदरा
सयाजी
गार्डनची निर्मिती १८७९ मध्ये महाराजा सयाजींनी केली. सयाजी गार्डन जवळपास
१०० एकरात पसरले आहे.भारताच्या पश्चिमभागातील हे सर्वात मोठे सार्वजनिक
उद्यान आहे.याच परिसरात सरदार पटेल तारामंडल, बडोदा संग्रहालय्,आर्ट गॅलरी,
टॉय ट्रेन्,प्राणीसंग्रहालय्,मत्स्यालय आणि विवीध प्रकारचे वृक्ष असणारी
बाग असे हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. एकाच परिसरात अनेक आकर्षण
असल्यामुळे गुजरात राज्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे हे उद्यान. इथल्या
प्राणी संग्रहालयात जवळपास १६७ प्रकारचे प्राणी आहेत.तर जवळपास ४५ प्रकारचे
सागरी जीव असणारे मस्त्यालय नुकतेच सुरु करण्यात आले आहे.इथेच अॅस्टॉनॉमी
पार्कची देखील उभारणी करण्यात आली आहे,जिथे प्राचीन भारतातील खगोल विषयक
उपकरणे आपण पाहु शकतो.
ईएमई मंदिर
एक मंदिराचे नाव म्हणून ईएमई हे एकायला थोडे विचित्र वाटते.या मंदीराची
उभारणी करणार्या लोकांना सन्मान देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली.
भारतीय सेनेत असणार्या धर्मनिरपेक्ष वृत्तीचे हे मंदीर एक प्रतिक आहे.
यालाच दक्षिणामूर्ति मंदिर असे देखील म्हणतात.हे एक शिवमंदीर आहे.याची
देखरेख भारतीय सेनेद्वारे केली जाते.या मंदिराला अॅल्युमिनीयमच्या
पत्र्याचे मढवून टाकले आहे.मंदीराची भुमितीय रचना हेच इथले आकर्षण
आहे.सातव्या ते पंधराव्या शतकातील मुर्तिंनी या मंदिराचा परिसर सजवला आहे.
या
मंदिराच्या उभारणीत प्रत्येक धर्माच्या प्रतिकाचा समावेश केला आहे. वरच्या
बाजुला असणारा कलश हिंदु धर्माचे प्रतिक आहे. घुमट हा इस्लाम धर्माचे
प्रतिनिधीत्व करतो. स्तंभाच्या शीर्षभागी असणारे प्रतिक बौध्द धर्माशी
संबधीत आहे.तर प्रवेशद्वाराची रचना जैन धर्माशी संबधित आहे. याच्या
उभारणीचा विचार सन १९६६ ला आर्मी क्वार्टरमध्ये सुरु झाला. जगातील प्रत्येक
धर्माची व्यक्ती एकाच छताखाली आली पाहिजे अश्या संकल्पनेतून या मंदीराची
निर्मिती झाली. मंदीर रविवारी बंद असते.आठवड्यातील इतर दिवशी सकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३० पर्यंत सर्वांसाठी खुले असते. पत्ता: एनआर। ईएमई मंदिर, फतेहगंज, गुजरात 390002
लाल बाग
वडोदर्यातील आणखी एक भेट द्यावे असे ठिकाण म्हणजे लाल बाग.इथे गेल्यावर मन प्रसन्न होते.
सूर्य नारायण मंदिर, वडोदरा
भारतात अनेक ठिकाणी सुर्यमंदीर
आहेत.त्यातील एक प्रसिध्द मंदीर म्हणजे हे वडोदर्याचे हे मंदीर हे मंदीर
भव्य आहे तसेच इथली शिल्पकला अतिशय देखणी आहे. या मंदिराची उभारणी १७ व्या
शतकात श्री गोविंदराव गायकवाड़ यांच्या काळात झाली.याच्या निर्मितीचे श्रेय
रावजी आपाजी दीवान यांना जाते. प्रातकाळी सुर्याला अर्ध्य देताना आपण आपले
भोग्,दुख,आजारपण या सर्वातून मुक्त होत असतो.वर्षभर या मंदीरात भाविकांची
गर्दी असते.
श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर
वडोदर्यातील
श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर खरोखरच एक सुंदर मंदीर
आहे.लाकडात केलेले नक्षीकाम आणि संगमरवरी तक्तपोशी यांनी या मंदीराला अधिक
देखणे बनवले आहे.हे मंदीर दोन मजली असून त्याच्या शिखरावर सुंदर नक्षीकाम
आहे.
कीर्ति मंदिर :-
वडोदरा
शहरात असलेल्या आणि इ.स. १९३६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड ( तिसरे )
यांनी निर्माण केलेल्या या मंदीराला कीर्ति मंडी किंवा कीर्ति स्तंभ असे
म्हणले जाते. पत्ता :-कीर्ति मंदिर, कोठी रोड, डाक बंगला, सयाजीगंज, वडोदरा, गुजरात 390001 वेळ :- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
काशी विश्वनाथ महादेव मंदिर :-
जवाहर
लाल नेहरू मार्गावर असलेले नवापारा काशी विश्वनाथ मंदिर हे सगळ्यात
प्राचीन मंदीरापैकी एक आहे.भगवान शंकराला समर्पित या मंदीराची वास्तुकला
देखणी आहे. शांत वातावरणात इथे मनशांती लाभते.मंदीराच्या परिसरातील
वनश्रीमुळे परिसर पवित्र वाटतो. पत्ता :-जवाहर लाल नेहरू मार्ग, नवापुरा, वडोदरा, गुजरात 390001
तपोवन मंदिर :-
कार्तिकस्वामी,बालाजी
आणि नवग्रह यांचे मंदीर म्हणजे वडोदर्यातील तपोवन. हिरव्यागर वनराईने
वेढलेल्या या मंदीरात एक ध्यानकक्ष आहे.मंदीराच्या परिसरात एक गोशाळा देखील
आहे.मंदीराचे स्थापत्य खुपच सुंदर आणि भिंतीवर असलेली चित्रकला आकर्षक
आहे.
पत्ता :- गुजरात रिफाइनरी रोड, सेक्टर -1, पेट्रोकेमिकल Twp, Undera, वडोदरा, गुजरात 391310
वेळ - सकाळी ६.४५ ते ११.१५ व संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.१५
कायवरोहन मंदिर :-
६८ तीर्थातील एक तीर्थ मानले जाणारे कायावरोहन मंदिर वडोदर्यातील एक
प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे.लुकुलिश याच्या भाविकामध्ये हे स्थळ महत्वाचे
मानले जाते. गझनीच्या मोहमदाने या मंदीराला उपद्रव दिला.पुढे २० व्या शतकात
योगाचार्य स्वामीजी कृपालुआनंदजी महाराज यांनी या मंदीराचे पुनर्निमाण
केले.
पत्ता : वडोदरा- मुंबई हायवे, NH 8, कायावरोहन, गुजरात 391220
वेळ: सकाळी ६ ते रात्री ९
धुंडीराज गणपति मंदिर:-
गणपतराव
गायकवाड़ यांच्या सत्ताकाळात दिवाण असलेल्या गोपाळराव मेयरल यांनी सन १८४४
मध्ये या दुमजली मंदीराची निर्मिती केली.मराठी लोकांचे इष्टदैवत म्हणजे
गणपती बाप्पा.त्यांचीच इथे प्रतिष्ठापना करण्यात आली.गुजरातमधील प्राचीन
मंदीरातील हे एक मंदीर. मंदीरावर असलेली कलाकुसर आणि रंग लक्षवेधी आहेत.
पत्ता :-सूर्यनगर, वडोदरा, गुजरात 390017
अरबिंदो आश्रम :-
सन
१८९४ ते १९०६ या कालावधीत योगी अरविंद घोष वडोदरा शहरात राहिले
होते.वडोदरा शहरातील डांडीया बाजार परिसरात असणार्या त्यांच्या
निवासस्थानाचे रुपांतर
अरबिंदो आश्रम, ज्याला अरविंद आश्रम
किंवा ऑरो निवास म्हणतात त्यात करण्यात आले. या आश्रमात २३ कक्ष, एक
ग्रंथालय, अभ्यासिका आणि विक्रीगृह आहे.योगी अरविंद घोषांनी लिहीलेली अनेक
पुस्तक इथे विक्रीला उपलब्ध आहेत.मेडीटेशन हॉलमध्ये ध्यान करुन मनशांती
मिळवण्यासाठी पर्यटक इथे येतात.
अध्यात्मात रुची असणार्या
प्रत्येक व्यक्तिसाठी आश्रम सदैव खुला असतो. आश्रमात येणार्या व्यक्ति
ध्यान्,अध्यात्म आणि माता यांना मानतात.या माता म्हणजे अरविंद यांच्या
शिष्या मीरा अल्फास. त्यांना अरविंद घोष माता मानायचे ,त्यांनी त्यांचे नाव
द मदर ठेवले होते.
सुर सागर झील, वडोदरा
वडोदरा शहराच्या मध्यभागी सुरसागर हा कृत्रिम तलाव हे शहरातील एक प्रमुख
आकर्षण आहे.हा पुर्ण वर्षभर पाण्याने भरलेला असतो.पर्यटकांसाठी इथे
नौकानयनाची व्यवस्था केलेली असते.गणेश चतुर्थीला याच तलावात गणपतीच्या
मुर्तीचे विसर्जन केले जाते. परिसरात रमणीय हिरवळ आणि वनराई आहे.तलावाच्या
शांत वातावरणात हरवून जायला होते. तलावाच्या मधोमध भगवान शंकराची १२० फुट
उंच मुर्ती आहे.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ :-
गुजरातमधील बडोदा येथील एक विद्यापीठ. १८८१ मध्ये महाराजा सयाजीराव
गायकवाड (१८६३−१९३९) यांनी बडोदा महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचेच
पुढे १९४९ साली विद्यापीठात रूपांतर झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड
यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात आले.
विद्यापीठाचे स्वरूप एकात्म व निवासी असून विद्यापीठ-परिसर ८०४ चौ.किमी.
पर्यंत पसरला आहे. कला, विज्ञान, विधी, शिक्षण आणि मानसशास्त्र, वैद्यक,
वाणिज्य तसेच तंत्रविद्या व अभियांत्रिकी या विद्याशाखांस शासकीय मान्यता
लाभली असून ललित कला, गृहविज्ञान आणि समाजकार्य या तीन विद्याशाखा नंतर
नव्याने उघडण्यात आल्या. विद्यापीठात बडोदा संस्कृत महाविद्यालय; भारतीय
संगीत, नृत्य व नाट्यकला महाविद्यालय तसेच इतर सात संस्था आहेत.
विद्यापीठाच्या शिक्षण व मानसशास्त्र या विद्याशाखेत विस्तार
अध्ययनकेंद्राची सोय असून तेथे संशोधन कार्य, शोधनिबंधाचे प्रकाशन व
चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तुत
विद्याशाखेस मान्यता दिली आहे.
काळा घोडा
न्याय मंदिर :-
सुरवातीला
हि वास्तु भाजीमंडई म्हणून बांधली होती. वडोदर्याचे महाराज सयाजीराव
तिसरे यांनी आपल्या धर्मपत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ हि वास्तु उभारली. याचे
आरेखन रॉबर्ट चिशोल्मने केले. हि वास्तु उभारताना इथे मंडई बांधावी अशी
कल्पना असली तरी बांधकाम पुर्ण होताना याचा उपयोग टाउन हॉल म्हणून व्हावा
अशी कल्पना पुढे आली. नंतर ३० नोव्हेंबर १८९६ ला व्हॉइसरॉय लॉर्ड एल्गिन
याच्या हस्ते या इमारतीचे रुपांतर न्यायमंदीरात झाले.दोन मजली आणि ६०००
स्क्वेअर फुट जागेत पसरलेली या वास्तुला उभारण्यासाठी ७ लाख रुपये खर्च
झाले.मधोमध मोझाईल टाईल्स लावलेले प्रशस्त सभागृह तसेच महाराणी चिमणाबाई
ज्या सयाजीरावांच्या पत्नी होत्या,त्यांचा पुतळा आहे.
पत्ता :- राष्ट्रीय महामार्ग ८, G.N.F.C कॉर्नर, झाडेश्वर्,भडोच ,गुजरात, 392011
नीलकंठ धाम मंदिर :-
गुजरातची
सांस्कृतिक राजधानी असणार्या वडोदरा शहरात अनेक मंदीर आहेत.पण या
सर्वांमध्ये नीलकंठधाम हे एक खर्या अर्थाने वेगळे मंदीर आहे.भडोच
शहरापासून ८० कि.मी. तर वडोदर्यापासून ६० कि.मी.वर असलेल्या पॉईचा गावात
विस्तृत आवारात पसरलेले हे नीळकंठ मंदीर स्वामीनारायण गुरुकुल ,राजकोट
यांनी निर्माण केलेले आहे.भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केलेले हे
मंदीर नर्मदा नदीच्या किनार्यावर आहे.मंदीरावर उत्कृष्ट दर्जाची शिल्पकला
आहे.प्रचंड परिसरात पसरलेल्या मंदीरात भव्य शिल्पांच्या माध्यमातून पौराणिक
कथा दाखवल्या आहेत.या मंदीर परिसरात रहाण्याची सोय देखील आहे.जगभरातून
पर्यटक या मंदीराला भेट देतात.
पत्ता : नीलकंठधाम रोड, पोइचा, गुजरात 393145
वेळ : सकाळी ९.३० ते संध्याकाळी ८.३०
कुबेर भंडारी शिव मंदिर :-
हे मंदीर कर्णाली गावाजवळ आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८०० फुट उंचीवर हे
मंदिर वसले आहे.मंदीराला जाण्यासाठी ६८० पायर्या चढाव्या लागतात.
वडोदर्यापासून इथे जाण्यासाठी नियमित बसेस आहेत.या मंदीराला पौराणीक
मह्त्व हि आहे.या मंदीराच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.भगवान शंकर आणि
माता पार्वती एकदा जंगलातून जात असताना चालण्याच्या थकव्याने पार्वतीमाता
या शिखरावर थांबल्या.मात्र इथे अन्न आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता
नव्हती.यामुळे भगवान शंकराना वाटले कि अन्न आणि पाणी व्यवस्थित आणि एकत्रित
मिळाले तर उत्तम.त्यामुळे पुढे भगवान शंकराना अन्न आणि पाण्याची देवता,
कुवेरभंडारी मानके जाउ लागले.
या मंदीराचे वातावरण पवित्र आणि शांत आहे.
पत्ता :कर्णाली गाव, तालुका डभोई, पीएस, चंदोद, गुजरात 391105
वेळ : सकाळी ४ ते १० वाजेपर्यंत
जारवानी धबधबा :-
वडोदरा शहरापासून ९० कि.मी. दुर शुलपनेश्वर वन्य अभयारण्यात जारवानी हा
बारमाही धबधबा आहे.इथे आपण ट्रेकींग्,फोटोग्राफी आणि पिकनिकचा आनंद घेउ
शकतो. तसेच जंगलाची सफर करण्याचा आपण आनंद आपण घेउ शकतो.
हाथनी धबधबा :-
पावागडपासून ३० कि.मी.वर हा धबधबा गर्द जंगलाने वेढलेला आहे.इथे अनेक
वनस्पती व प्राणी पहायला मिळतात. हा परिसर सर्व वयोगटातील पर्यटकांना
आवडतो. मात्र तरुणवर्ग इथे मोठ्या प्रमाणात येतो. या धबधब्याचे नाव हथनी
पडण्यामागे एक कथा आहे.ती अशी, खुप वर्षापुर्वी इथे रहाणार्या आदिवासी
लोकांनी हत्तीच्या पिल्लाच्या आकाराची एक शिळा या परिसरात पाहिली.आजही आपण
या धबधब्याच्या परिसरात गेलो तर फुले आणि कापड अर्पण केलेली हि शिळा पाहु
शकतो. इथल्या आदिवासींची हथनी माता हि प्रमुख देवता आहे.यामुळेच या
धबधब्याला हथनी धबधबा असे नाव पडले.
कड़िया डूंगर लेणी :-
भडोचजवळ
असलेल्या हि लेणी इ.स.पहिल्या आणि दुसर्या शतकात कोरलेली आहेत असे मानले
जाते.या लेणी समुहात सात विहार आणि एक स्तुप आहे.इथे सिंहप्रतिमा असलेला
स्तंभ आहे.
अजवा निमेता डॅम गार्डन :-
वडोदरा
शहराजवळ वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उभारलेल्या आणि १३० एकर परिसरात
पसरलेल्या या बागेचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे.इथे संध्याकाळी असणारा
लाईट आणि साउंड शो आवर्जून बघावा असाच आहे.म्युझीकल फाउंटन हे इथले मुख्य
आकर्षण.
सुरत....
सूरत जिल्ह्यातील एक मुख्य शहर. भारतातील गुजरात जवळील तापी नदीच्या
किनार्यावर निवांतपणे वसलेले हे एक समृद्ध शहर..... हें शहर तापी नदीच्या
दक्षिण तीरावर असून समुद्रापासून जलमार्गानें साधारण २५ किमी व खुष्कीच्या
मार्गानें साधारण २० किमी अंतरावर आहे. मुंबईवरून सूरत साधारण २७० किमी,
तसेच गुजरातच्या राजधानीपासून म्हणजेच गांधीनगर पासून सुमारे २८५ किमी,
अहमदाबादपासून २९० किमी अंतरावर आहे.
तापी नदी, सूरत
कोणे एके काळीं सूरत हें हिंदुस्थानांतील व्यापाराचें मुख्य ठिकाण असून
येथे आजही बर्याच मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. सूरत शहर हे येथील
जेवणासाठी, कपड्यांसाठी आणि उत्तम प्रतीच्या हीर्यांसाठी (सॉलिटेर) आजही
खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की जगातील ९०% कच्च्या हीर्यांना येथे पैलू
पाडले जातात, तसेच यांना उत्तमरित्या पॉलिश केले जाते. अमेरिकेतली मोठ्या
शहरांतील १० पैकी ९ हीरे सुरतेवरूनच पॉलिश करवून नेले जातात. हीर्यांना
पॉलिश करणारा मुख्य कारखाना सुरतेतील वराछा आणि कटारग्राम येथे असून, सूरत
हे संपूर्ण दुनियेतील सर्वात मोठे हीर्यांचे व्यापारी शहर आहे.
हीर्यांप्रमाणेच येथील सूती, रेशमी, किमख्वाबाचे कापड (किनखापाचे कापड, एक
प्रकारचे जरतारी वस्त्र ), तसेच सोन्याचांदीच्या वैविध्यपूर्ण वस्तूंसाठी
खूप प्रसिद्ध आहे, म्हणूनच सुरतेला ‘सिल्क सिटी’ तसेच ‘डायमंड सिटी’ म्हणून
सुद्धा ओळखले जाते
सुरतेचे वर्णन सर्वात आधी महाभारतात सापडते.. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण
मथुरेवरून द्वारकेला जात होते, त्यासुमारास विश्रांतीसाठी ते इथल्या रमणीय
स्थानी विसावले होते, असा उल्लेख ‘महाभारत’, तथा ‘सारथी सर्वांचा’ ह्या
दोन्ही पुस्तकात केलेले आढळतो. तापी नदी ज्या ठिकाणी समुद्रात
विसावण्यासाठी अचानकच पश्चिमेच्या दिशेने वळते, त्याच वळणावर सूरत वसलेले
आहे. हिंदुस्थानातील ज्या ठिकाणांशी यूरोपियन लोकांचा सर्वात आधी संबंध
आला, त्यातील एक ठिकाण म्हणजे सूरत. टॉलेमी ( इ. स. १५०) या प्रसिद्ध
ग्रीक भूगोलतज्ञानें, पुलिपुल (म्हणजे कदाचित् सुरत शहरांतील फुलपाद हा
पवित्र भाग असावा) या व्यापारी ठाण्याविषयी लिहिलेलें आहे. तेराव्या
शतकांत, कुतुबुद्दीनने अन्हिलवाड़चा रजपूत राजा भीमदेव याचा पराभव करून
रांदेड व सुरत गावापर्यंत चाल केली असें मुसुलमान इतिहासकार लिहितात. १३४७
मध्ये, महंमद बिन तुघलखाच्या कारकीर्दीमध्यें गुजराथेंत बंड झालें असतां
राजपूतांच्या सैन्यानें सुरत शहर लुटून नेलें. भिल्लांपासून संरक्षण
करण्याकरितां फेरोझ तुघलखानानें येथें १३७३ मध्ये किल्ला बांधला.
अर्वाचीन सुरत शहराच्या स्थापनेबाबतीत काही दंतकथा आहेत... ११व्या शतकात
शहराचे नाव ‘सूर्यपुर’ (भगवान सूर्याचे शहर ) होते. त्यानंतर १२व्या शतकात
सुरतेत पारसी लोक येऊन राहू लागले. त्यांनंतर कुतुबुद्दीन ऐबकने हल्ला
केल्यावर हे सूरत शहर पश्चिमी चालुक्य साम्राज्याचा एक भाग झाले. १५ शतकात
सुरतेतील शाही राजवटीत गोपी नावाचा एक सरदार होता, त्याने १५व्या शतकाच्या
सुरूवातीला ब्राम्हणाद्वारे विविवत पूजा करून पुन्हा ह्या शहराची रचना केली
आणि कालांतराने त्यांत आवश्यकतेनुसार अनेक सुधारणा केल्या. कालांतराने
१५१२ ते १५३१ या सालांत पोर्तुगिज लोकांनीं हें सूर्यपुर शहर जाळून त्याचे
खूप नुकसान केले, त्यावर कबजा करण्याचा प्रयत्न केला, १५१३ मध्ये इथे
आलेल्या पोर्तुगिज व्यापारी ‘ड्युरटे बार्बारोस’ याने लिहून ठेवलेल्या
नोंदीनुसार त्याकाळी सुरतेला अतिशय समृद्ध आणि महत्वाचे बंदर बांधलेले
होते, जिथे जगाच्या कानाकोपर्यातून अनेक जहाजे येत – जात असत. सुरतेच्या
राजाकडे मोठ्या प्रमाणात कमाई करणारे एक अतिशय महत्वाचे बंदर तसेच ह्या
बंदरात व्यापार्यांनिमित्त देशभरातून येणारी जहाजे, याचा पोर्तुगीज
सत्ताधीशांना लोभ असावा, आणि म्हणूनच त्यांनी सूरत शहराला अनेक वेळेस जाळले
असल्याचे म्हटले जाते.
सुरतेचा किल्ला
सूरत येथील जुना किल्ला १५२० पर्यंत या शहराला ‘सूरत’ म्हणून चांगल्या
प्रकारे ओळखले जाऊ लागले होते. पुढे सुमारें १५५६पर्यंत अहमदाबादच्या
राजांनीं येथील जुना किल्ला चांगला मजबूत केला. अहमदाबादचा राजा सुलतान
महमुद शाह तिसरा (१५३८ – १५५४), जो सूरतच्या वारंवार विनाशाने फारच नाराज
होता, त्याने एक अतिशय मजबूत किल्ला बांधण्याचे आदेश दिले आणि त्याने
किल्ला बांधायचे काम सैन्यातील एका तुर्की माणसाकडे सुपूर्द केले, त्यांना
मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदी देण्यात आल्या आणि त्यांना एक मजबूत किल्ला
तयार करण्याची आणि बांधणी करण्याचे आदेश देण्यात आले. सुलतानाच्या मनाजोगता
भक्कम किल्ला बांधलेला पाहून त्याने त्या तुर्की माणसाला भरपूर बक्षिशी
दिली आणि त्याचे नाव बदलले. सुरतेच्या किल्ला बांधणार्या तुर्की माणसाचे
आता नाव झाले ‘खुदावंतखान’.... सूरत कॅसल, किंवा सूरत किल्ला ही इमारत
म्हणजे १६व्या शतकाची रचना आहे.
सुरतेचा किल्ला
सूरत येथील जुना किल्ला
सूरत कॅसल
सूरत कॅसल दरवाजा १५७३मध्ये मुघल सम्राट अकबरानें हे सूरत शहर काबीज केलें;
व तेव्हांपासून सुरत शहर व जिल्हा पुढे १६० वर्षेपर्यंत मोंगलांच्या
ताब्यांत होता. १६व्या शतकाच्या अंतापर्यंत सुरतलगतच्या समुद्रांत,
सुमुद्रामार्गे होणार्या व्यापारावर पोर्तुगीज लोकांचें पूर्णपणें वर्चस्व
स्थापन होऊन त्यांना कोणीच प्रतिस्पर्धी उरला नव्हता.
सूरत कॅसल
सूरत कॅसलदरवाजा
पुढे १६१२ मध्ये गुजराथच्या सुभेदारानें इंग्रज व्यापार्यांशी तह करून
त्यांना सुरत, खंबायत, गोध्रा व अहमदाबाद येथें व्यापार करण्याची परवानगी
दिली. त्यानंतर इंग्रज व्यापार्यांनी पोर्तुगीज लोकांचा पराभव करून,
बादशहाकडून लवकरच फर्मान मिळविलें व हिंदुस्थानांत आपली पहिली वखार स्थापन
केली. डच लोकांनीही सुरतमध्यें वसाहत करून, तेथें वखार घालण्याची परवानगी
मिळविली.
सूरतेतील डच व्यापार्यांची पहिली वखार
सुरतेतील इंग्रज व्यापार्यांची पहीली वखार
सुरतेत कीम व तापी याखेरीज जिल्ह्यांत दुसर्या मोठ्या नद्या नाहीत; परंतु
दक्षिणेकडे खोल व होड्या चालण्यायोग्य खाड्या असून जिल्ह्यांतील माल बाहेर
पाठविण्याकरिता व किनार्यानेच जाणार्या लहान लहान होड्यांना आश्रय
घेण्याकरिता त्यांचा फार उपयोग होतो. सीन, तेन, व कनई या मुख्य खाड्या होत.
सर्व जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणांत खजुराचीं झाडें आढळतात; व गावांत आंबा,
चिंच, वड, पिंपळ वगैरे फळें व छाया देणारी झाडें सामान्यपणें दृष्टीस
पडतात. सुरतेच्या आंब्यांचा स्वाद व गोडी हीं मुंबईच्या हापूस किंवा
पायरीच्या आंब्यासारखीं असतात. सुरतच्या जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल,
रानडुक्कर, कोल्हा, तरस, हरिण, काळवीट वगैरे रानटी श्वापदें आहेत.
मध्ययुगीन काळात सूरतची ओळख पटविण्याच्या संदर्भात विभिन्न
इतिहासकारांनी अनेक मते व्यक्त केली असली तरी, सर्व ऐतिहासिक गोष्टींमध्ये
सूरत जागतिक व्यापारांच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण बंदरांपैकी
एक म्हणून उभे आहे. सुरतेच्या राजाकडे मोठ्या प्रमाणात कमाई करून देणारे
एक अतिशय महत्वाचे बंदर म्हणून सूरतच्या बंदराची ख्याती होती. पूर्वी
सुरतची किनखाब प्रसिद्ध होती; व सुरतेस जाडें भरडे रंगीत, सुती कापड आणि
भडोच येथें मलमल होत असे. आफ्रिकेंतून गेंड्याचें कातडें आणून सुरत येथें
त्याच्या सुंदर ढाली तयार केल्या जात. एके काळीं, येथें जहाजें
बांधण्याचें काम पारशी लोक करीत असत. हल्लीं सुती व रेशमी कापड विणणें हाच
जिल्ह्यांतील मुख्य उद्योग-धंदा आहे. सुरत शहरीं गिरण्या आहेत. रेशमी
किनखाबीचें व कशिद्याचें काम अद्यापही या शहरीं होत असतें. या जिल्ह्यांत
एक मिठागर आहे. धान्य, कापूस, मोडाचीं फुलें, इमारती लाकूड व बांबू हे
मुख्य निर्गत जिन्नस असून तंबाखू, सरकी, लोखंड, नारळ व विलायती कापड हे
मुख्य आयात केले जाणारे जिन्नस आहेत.
पारशी अग्यारी, सुरत
निरनिराळ्या राजांच्या अमलाखालील इतिहास जिल्ह्याच्या वर्णनांत दिला
आहे. मोंगलकालीन सुरत शहरांत लोकवस्ती बरीच असून संपत्तीही पुष्कळ होती व
घरें सुंदर असून व्यापार बराच मोठा होता, असें जुने प्रवासी वर्णन करतात.
इंग्रज व डच यांच्या वसाहतींपासून औरंगजेब गादीवर बसेपर्यंतचा काळ तर फारच
भरभराटीचा गेला. संपत्तीबरोबर शहराच्या शोभिवंतपणातही भर पडली.
हिंवाळ्यांत, कामाच्या हंगामाच्या वेळीं बाहेरून बरेच लोक गांवांत
आल्यामुळे सर्वांनां रहावयास पुरेशी जागा मिळणें कठिण पडत असे. सुरत आणि
गोवळकोंडें, आग्रा, दिल्ली व लाहोर यांच्या दरम्यान उंटांचे तांडे जात येत
असत. कोंकण व मलबार किनार्यावरून जहाजें येत, यूरोपियन व्यापाराखेरीज
अरबस्थान, इराणचें आखात, सिलोन व सुमात्रा येथूनहि व्यापारी येत असत. सुती व
रेशमी कापड मुख्यतः बाहेर पाठविलें जाई. यूरोपियन लोक आपल्या सर्व मालाची
चढउतार सुरत येथें न करतां फक्त कांहीं माल उतरून येथून नीळ व दुसरे जिन्नस
बरोबर घेऊन जात व निळीखेरीज सर्व माल सुमात्रा, जावा, वगैरे बेटांत उतरून
तेथून मसाल्याचे जिन्नस यूरोपांत नेत. डच लोकांची हिंदुस्थानांतील मुख्य
वखार सुरत येथें होती, व फ्रेंचांनींहि तेथें रहाण्यास सुरवात केली होती.
खंबायतच्या आखातांत सांचलेला गाळ, उत्तर गुजराथेंतील अस्वस्थता, व
मस्कतच्या अरबांनीं दीवचा केलेला नाश, या कारणांमुळें सर्व प्रांतांचा
व्यापार सुरत शहरीं एकवटला होता. शिवाय तें ''मक्केचें द्वार'' असल्यामुळें
त्याचें महत्त्व बरेंच वाढलें होतें.
किल्ला पहाण्याची वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६ पत्ता-तापी नदीच्या किनार्यावर प्रवेश फि :-मोफत
सूरत बंदर मराठ्यांच्या
उत्कर्षाबरोबर येथील भरभराटीला कांहीं काळपर्यंत आळा बसला. सुरतवर
मराठ्यांचा पहिला हल्ला १६६४ त झाला. त्यावेळीं शिवाजी महाराजांनी तीन
दिवसपर्यंत शहर लुटून सुमारें १ कोट रुपये नेले. मराठ्यांशीं गोडीगुलाबीनें
राहून यूरोपियन लोक आपलें नुकसान होऊं देत नसत. १६६९ मध्ये शिवाजी
महाराजांनी सुरतवर दुसरी स्वारी केली व पुन्हां शहर लुटलें. तथापि सतराव्या
शतकाच्या अखेरच्या धामधुमीच्या काळांत सुरत शहराची भरभराट परमावधीस पोंचली
होती. जगांतील सर्व व्यापारी राष्ट्रें येथें व्यापार करीत होतीं. हिंदी
महासागरांतून जाणारें कोणतेंहि व्यापारी जहाज सुरतेस माल विकत
घेतल्याशिवाय, विकल्याशिवाय अथवा भरल्याशिवाय सहसा जात नसे. परंतु
औरंगझेबाच्या कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षांत, अंशतः मुंबईचें महत्त्व
वाढूं लागल्यामुळें व अंशतः खुद्द सुरतेस अव्यवस्था माजल्यामुळें या
शहराचें महत्त्व इंग्रजांच्या दृष्टीनें बरेंच कमी झालें होते. म्हणून १६८७
त त्यांनीं आपलें व्यापारी ठाणें मुंबईस नेलें.
सूरत बंदर
सुरतेतील खजीना
औरंगजेबाच्या कारकीर्दीत या जिल्ह्यावर मराठ्यांचे वारंवार हल्ले होत
होते. इ. स. १७०७ मध्यें औरंगजेब मरण पावल्यावर दिल्ली बादशहाची सत्ता कमी
होत जाऊन, शहराच्या तटबंदीपर्यंत मराठ्यांनीं आपली सत्ता स्थापन केली. १७३३
सालीं सुरतचा मोंगल सुभेदार तेघ बख्तखान स्वतंत्र झाला. याच्या मृत्यूनंतर
सुरतेंत बेबंदशाही माजली, इंग्रजांचें वर्चस्व स्थापन झालें. पुढें तब्बल
४१ वर्षे म्हणजे इ. स. १८०० पर्यंत सुरतेतील नवाब जरी नांवाला स्वतंत्र
होते तरी बहुतेक कारभार इंग्रजच चालवित असत. १७९९ मध्ये येथील शेवटला
नामधारी नवाब मरण पावल्यानंतर सुरत व रांदेड हीं ठिकाणें इंग्रजांच्या
पूर्णपणे ताब्यांत आलीं. नव्या नवाबाला फक्त नवाब ही पदवी आणि कांहीं
पेन्शन देण्यांत आलें. सूरत शहराला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. मुगल
राजवटीदरम्यान मुस्लिमांना तीर्थक्षेत्र म्हणून हे शहर ‘मक्का प्रवेशद्वार’
म्हणून वापरण्यात आले. पोर्तुगीजांनी शहरांचे नियंत्रण राखण्याच्या
प्रयत्नात शहराचा नाश केला आणि ईस्ट इंडिया कंपनीने ते व्यापार केंद्र
म्हणून वापरले. या ऐतिहासिक शहराला बर्याच अडथळ्यांना तोंड द्यावे लागले
आहे आणि तरीही गुजरात राज्यातील व्यापाराचे केंद्र म्हणून आणि जागतिक
डायमंड सेंटर म्हणून उभं राहिलं आहे. सद्यस्थितीत मात्र सुरतेच्या
किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे, पर्यटकांना किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश
करण्यासाठी परवानगी नाही. बाहेर जर नशिबाने कोणी किल्ल्याविषयी मनोभावे
माहिती देणारे भेटलेच ( जे भरपूर कठीण आहे ), तर किल्ल्याची थोडीफार माहिती
मिळते. किल्ल्याच्या आत बघण्यासारखे आता काहीच उरलेले नाही.....
किल्ल्याचे महाद्वार म्हणजे मुतारी बनलेली आहे.... जर किल्ल्याच्या
कोपर्यावर पोलिसांचा पहारा नसेल, तर तापी नदीच्या दिशेने म्हणजे
किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याचे फोटो काढता येतात, पण बघायला काहीच
मिळत नाही. काही दिवसापूर्वी मात्र, सुरतची महानगर पालिका, आता ह्या
किल्ल्याला पुन्हा पूर्वेचे रूप देणार आहे, अशी बातमी वाचली होती.....
अग्नि मंदीर ,नवसारी
तापी नदी ,सुरत
हे सुरतेचे वर्णन वाचून कोणी इतिहासप्रेमी सूरत शहर बघण्यास जातील
तेव्हा, तिथल्या पडझड झालेल्या ऐतिहासिक इमारती सोडल्यास रस्त्यांची
दुर्दशा, प्रचंड गर्दी या शिवाय काहीही हाती लागणार नाही, आणि हो स्वत:ची
गाडी घेऊन जाणार असाल, तर पेट्रोल / सीएनजी महाराष्ट्राची हद्द संपण्याच्या
आधीच भरून घ्या. एकतर ह्या रस्त्यावर सीएनजी मिळणे महाकठिण, ऐन सूरत शहरात
पेट्रोल पंप आहे, मात्र महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त भावाने सीएनजी भारावे
लागेल, याची खात्री ठेवा.
मुगल सराय :-
या मोघलकालीन वास्तुचे नावच त्याचे एतिहासिक महत्व सांगते.मोघलकाळात
चालणारा प्रवास जाणून घ्यायला पर्यटक इथे भेट देतात.मोघलांच्या काळात हि
वास्तु म्हणजे खानावळ होती.मात्र आज या इमारतीत सुरत महानगरपालिकेची सरकारी
ऑफिसेस आहेत. आजही आपण या वास्तुवर नक्षीकाम आणि कलाकुसर पाहु शकतो.
जवळपास असणार्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उत्तम आणि अस्सल गुजराती भोजन
मिळते.
वेळ-चोवीस तास
पत्ता- शहराच्या प्रमुख भागात
प्रवेश फि- मोफत
डच गार्डन :-
डच गार्डन असे नाव असले तरी प्रत्यक्षात हि डच लोकांची स्मशानभुमी
आहे.जेव्हा डच आणि ब्रिटीश लोक भारतात व्यापारानिमीत्ताने येउन स्थायिक
झाले,तेव्हा दरम्यानच्या काळात त्यांच्यात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांची
थडगी येथे आहेत. मात्र तापी नदीच्या किनारी उभारलेल्या या बागेत हिरवळीचे
पट्टे,झाडाझुडूपांची आकर्षक मांडणी ,युरोपियन शैलीत बांधलेल्या वास्तु आणि
थडगी यामुळे सुरतमध्ये अगदी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. बागेतील
थडग्यांपैकी बॅरॉन अॅड्रीयन व्हॅन रीड या डच कंपनीच्या प्रमुखाचे थडगे
लक्षवेधी आहे.
वेळः- सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते रात्री ११.
पत्ता: नानपुरा
प्रवेश फि- मोफत
स्वामी नारायण मंदीर :-
तापी
नदीच्या किनार्यावर हे सुंदर मंदीर उभारलेले आहे.या मंदीरात तीन मंदीर
समुह आहेत.पहिले मंदीर राधा-कृष्ण, हरिकृष्ण महाराज यांचे आहे तर दुसरे
गुणातितानंद महाराज यांना वाहिलेले आहे तर तिसरे मंदीर स्वामीनारायण आणि
गोपालानंद स्वामी यांचे आहे.पुर्ण मंदीर स्वामीनारायण पंथाच्या वैश्णव
उपासकांसाठी आहे.मंदिरावर उत्तम कलाकुसर आणि शिल्पकला आहे.
अंबिका निकेतन मंदीर :-
तापी नदीच्या काठी असलेल्या या मंदीरात भाविकांची मोठी वर्दळ असते. या
मंदीराची उभारणी १९६९ मध्ये झाली.या मंदिरात दोन उपमंदीर आहेत.एक
राम-सीतेचे आहे तर दुसरे लक्ष्मीनारायणाचे आहे.मुख्य मंदीर माता अंबिकेचे
आहे.नवरात्रीत इथे मोठा उत्सव असतो.अग्दी नास्तिक व्यक्तिंनी देखील या
मंदीराला भेट द्यायला हरकत नाही.अतिशय शांत वातावरण आणि पावित्र्य यामुळे
इथे मनशांती मिळते.इथून तापी नदीचे सुंदर दृष्य दिसते.तसेच बोटींगचा आनंद
देखील घेता येतो.
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५
पत्ता- आनंद नगर
चिंतामणी जैन मंदीर :-
संगमरवरी दगडात उभारलेल्या या मंदीराचा बाह्यभाग साधा असला तरी सुंदर
शिल्पाकृती पहायला मिळतात.याची उभारणी इ.स.१६९९ मध्ये राजा कुमारपालयांनी
केली असे मानले जाते.मंदीरात जैन आचार्य हेमचंद्र यांनी भाज्यांपासून
बनवलेल्या रंगाचा उपयोग करुन कलाकुसर केलेली आहे.तसेच लाकडावर कोरीवकाम
करुन त्यावर काढलेली चित्रही बघायला मिळतात. सुरतमधील हे एक प्रमुख आकर्षण
आहे.मंदीरात कोणतेही प्रवेशशुल्क नाही.
खुदावंदखानाची कबर :-
चकाला बाजार परिसरात असणारी हि कबर म्हणजे सुरतेच्या विकासात महत्वाचा
वाटा उचलणार्या शासकापैकी एक खुदावंदखान याची कबर आहे.यानेच सुरतेच्या
व्यापाराचा खर्या अर्थाने पाया आणि इथे समृध्दी आणली. इस्लामिक शैलीत
बांधलेला हा दर्गा आकर्षक वास्तुरचनेचे उदाहरण आहे.
चकाला
बाजार हा परिसर पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावा असाच आहे.इथेच आपण सुरतचे
प्रसिध्द बांधणी दुपट्टे, कपड्यांच्या बॅग्,चपला आणि काचेच्या वांगड्या
खरेदी करु शकतो.
वेळः- सकाळी ६ ते संध्याकाळी ६
पत्ता - चकाला बाजार रस्ता
प्रवेश फि- मोफत
सरदार पटेल म्युझीयम :-
श्री.बाबुभाई जशभाई पटेल यांनी सन १९७८ मध्ये सुरु केलेल्या या
वस्तुसंग्रहालयात पर्यटकांना आकर्षण ठरतील अशा अनेक वस्तु आहेत.इथे प्राचीन
कलाकुसरीच्या वस्तु, नकाशे, पुस्तक, चित्रे,पुतळे,एतिहासिक वस्तु
बघण्यासाठी उपलबध आहेत.वस्तुसंग्रहायलाची इमारत म्हणजे इ.स.१६२२ मध्ये
शहजहानने बांधलेली वास्तु आहे.नंतर या वास्तुचा ताबा इंग्रजांकडे गेला.इथे
वस्तुसंग्रहालय सुरु होण्यापुर्वी रविंद्रनाथ टागोर यांनी काही काळ निवास
केला होता.या वस्तुसंग्रहालयात प्लॅनेटीरीयम आहे.त्याच बरोबर विश्वाच्या
निर्मितीची कथा सांगणारा साउंड आणि लाईट शो आहे.
वेळः- सकाळी ९ ते संध्याकाळी ५
पत्ता- गांधी सरदार स्मृती चौक
प्रवेश फी- प्रौढ -२०/- व मुल -१०/-
जगदीशचंद्र बोस मत्स्यालय :-
कुटुंबाबरोबर सुरत शहाराची सैर करत असाल तर हे मत्स्यालय हे न चुकवावे
असे ठिकाण, दोन मजली असलेल्या या नत्स्यालयात गोड्या आणि खार्या
पाण्यातील विवीध मासे जवळपास ५० टाक्यात ठेवलेले पहायला मिळतात. जेलीफिश
आणि शार्क माशांची टाकी हे इथेले विशेष आकर्षण.
सायन्स सेंटर :-
सायन्स सेंटर हा सुरतमधील विशेष आकर्षणाचा भाग आहे.अबालवृध्द अश्या
सर्वांसाठी आकर्षण असलेले हे सेंटर आहे.इथे एकाच ठिकाणी प्लॅनेटेरीयम्,आर्ट
गॅलरी, वस्तुसंग्रहालय, अॅम्फी थिएटर आणि प्रेक्षागृह आहे.या सर्व
इमारतींवर असलेल्या छताला सोलार पॅनेल जोडून वीजनिर्मिती केली
जाते.भविष्यात इथे डायमंड गॅलरी, टेक्सटाईल गॅलरी आणि कॉसमॉस गॅलरी सुरु
करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
स्नेह रश्मी बोटॅनिकल गार्ड्न :-
शहराच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुट्टी घेउन दरवेळी कोठे लांब जाणे अशक्य
असते.मात्र सुरत शहरातील स्नेहरश्मी बोटॅनिकल गार्डन हे तनामनावरचा ताण
घालवून ताजेतवाने होण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
गवियर तलाव :-
गवियरची पाणथळ जागा सुरत महापालिकेने संरक्षित म्हणून घोषीत केली
आहे.हि जागा म्हणजे स्थलांतरील पक्षांचा स्वर्ग म्हणता येईल.या ठिकाणी
व्हिसलिंग डक, यलो फ्रंटेड पाईड वुडपेकर, निळा छोटा खंड्या, इंडीयन पिफ
आउल, निळा सुर्यपक्षी असे पक्षी पाहु शकतो.
रंग उपवनः-
सुरतमधील हि सगळ्यात मोठा खुला रंगमंच.इथे अनेक गुजराती आणि इतर भाषीक
नाटकांचा प्रयोग होतात.नाटकांशिवाय इथे संगीताच्या मैफिली आणि योगासनाचे
धडे दिले जातात.हे नाट्यगृह बहुतेकवेळा कार्यक्रमांसाठी बुक केलेले
असते.ज्याला सुरतच्या सांस्कृतिक क्षेत्रात डोकावायचे आहे त्यांनी रंग
उपवनला जरुर भेट द्यावी.
वेळः सकाळी १० ते रात्री १०
पत्ता-नानपुरा
प्रवेश शुल्कः मोफत
सारथाना नॅशनल पार्क :-
देशातील सर्वात मोठ्या अश्या या फुलपाखरु उद्यानाची उभारणी १९८४ मध्ये
झाली.फुलपाखरांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती इथे पहायला मिळतात आणि त्यांना
त्यांच्या नैसर्गिक अधिवासात रहाता येईल अश्या रितीने रचना केली आहे.अर्थात
फुलपाखरु सोडून इथे अन्य काही वन्य जीव पहायला मिळतात्,जसे हरणे, माकड,
जंगली ससे, झेब्रा आणि काही जातीचे पक्षी इथे पहाता येतात. सुरत शहराच्या
परिसरात बघण्यासारखे हे ठिकाण आहे.
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५
पत्ता- आनंद नगर
प्रवेश फि- १५/- रुपये
हजारिया :-
अरबी समुद्राच्या किनार्यावर हझारिया हि टाउनशिप उभारण्यात आली
आहे.भारतातील हे एक प्रमुख बंदर आहे. इथे बर्याच कंपन्यांची ऑफिसेस
आहेत.त्यामुळे हा परिसर विकसित औद्योगिक क्षेत्र म्हणुन पुढे आला आहे.या
परिसरातील समुद्रकिनार्यामुळे हा भाग स्थानिकांमध्ये पर्यटनासाठी आकर्षण
आहे.तसेच इथे असलेल्या नैसर्गिक झर्यांमुळे आरोग्याच्या तक्रारी दुर
करण्यासाठी लोक इथे येतात.
दमास बीचः-
अरबी समुद्राच्या किनार्यावर असलेला हा बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.जवळपास
२ कि.मी.लांबी असलेला हा किनारा गर्दीने सदैव ओसंडून वहात असतो. इथे
आपल्याला खाद्यपदार्थाचा आनंदही घेता येतो. मात्र या किनारा झपाटलेला आहे
अशी पर्यटकांची समजुत आहे आणि त्यासंदर्भात काही कथा इथे सांगितल्या जातात.
बारडोली बीचः-
इतिहासप्रसिध्द दांडी यात्रेमुळे भारतीय स्वातंत्र्ययुध्दात बारडोलीच्या
समुद्रकिनार्याने एक अढळ स्थान मिळवले आहे.अ तिशय शांत आणि स्वच्छ असा हा
समुद्रकिनारा सुरतभेटीत पर्यटकांचे आकर्षण आहे.या समुद्रकिनार्याच्या
परिसरात उत्तम दर्जाची हॉटेल आहेत.
सुवाली बीच :-
सुरत शहरापासून २० कि.मी.वर हा देखणा समुद्रकिनारा आहे.केवळ सुरतच काय
कदाचित गुजरातमधील उत्तम किनार्यापैकी हा एक आहे.खुप गर्दी नसल्यामुळे इथे
शांतपणे निसर्गाचा आनंद घेता येतो.
तिथल बीच :-
वलसाड शहराच्या द्क्षिणेला काळ्या रेतीचा हा समुद्रकिनारा आहे.वलसाड
शहरातून रिक्षा किंवा बसने आपण इथे पोहचु शकतो. तिथलला स्वामी नारायण मंदीर
आणि साईबाबा मंदीर अशी दोन मंदीर आहेत.स्वामी नारायण मंदीरावर कोरीवकाम
पहायला मिळते.तिथलला सुरतवरुन देखील थेट जाता येते.जर मकरसंक्रातीच्या
काळात पर्यटक इथे आले तर इथल्या पंतगोत्सवात भाग देखील घेता येतो.
वंसदा नॅशनल पार्क
सह्याद्रीच्या
रांगेत वसलेले हे अभयारण्य मुख्य सुरत शहरापासून दुर आहे.सुर्यकिरण देखील
प्रवेश करु शकत नाहीत अश्या घनदाट जंगलात भटकंती करुन वन्य जीवनाचा अनुभव
घेणे रोमांचकारी आहे.अंबा नदीच्या किनार्यावर २४ चौ.कि.मी परिसरात हे
अभयारण्य आहे.इथे निरनिराळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. यामध्ये
तरस्,चौशिंगे, हरण, बिबटे,तसेच अजगर, घुबड असे अनेक वन्य प्राणी
दिसतात.सापुतार्यापासून हे अभयारण्य ४० कि.मी. वर आहे.
वंसदा नॅशनल पार्कची वेळ:
सकाळी ९ ते संध्याकाळी ५
वंसदा नॅशनल पार्क की एंट्री फी :
पर्यटकांचे प्रवेश शुल्क :- २०/-
कॅमेरा फि- १०० रुपये.
गाईड फि:- १०० रुपये ( १ तासाकरता )
गुजरातमधलं एकमेव हिल स्टेशन सापुतारा
भारत
हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा
ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं,
प्राणी यांना ते देव मानतात. यांपैकी अनेक ठिकाणी प्राण्यांची पूजा करण्यात
येते. आज आपण जाणून घेऊयात अशा एका ठिकाणाबाबत जे आपल्या सौंदर्यासोबतच
तेथील परंपरा आणि प्रथांसाठीही ओळखले जातं. हे ठिकाण भारतातीलगुजरात
राज्यामध्ये स्थित असून तेथील हिल्स स्टेशनपैकी एक आहे. सापुतारा हिल्स हे
गुजरातमधील असं ठिकाण आहे. जिथे नागाला देव मानल जातं. दरवर्षी लाखो पर्यटक
येथे फिरण्यासाठी येतात.
निखरे यौवन सा यह ज्वारा नाम है इसका सापुतारा । अपनी डगमगसे इतराता ‘भु’ को यु दिठीनी दिखलाता मानो नि:शेष रमणीयतासे प्रकृतिने इसका रुप संवारा ॥ ”
अरे... हो... आश्चर्य वाटले ना ! पण ही कोणा प्रेयसीवर लिहिलेली
कविता नाही. ही कविता आहे एका नयनरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे सापुतारावर
खुश होऊन लिहिलेली एका निसर्गप्रेमी कवीची कविता आहे. गुजरात व
महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातचे
रत्नजडित मुकूट किंवा ‘क्राऊनिंग ग्लोरी’ ची उपमा दिली तरी त्यात
अतिशयोक्ती नाही. दोन्ही बाजूंनी दाट जंगलांमधून चाललेल्या बसमधून
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत आपण सापुतारा येथे पोहोचतो. सापुतारा या
शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे. साप - उतार, म्हणजेच
सापाचे निवासस्थान. वृद्धलोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की, प्राचीन
काळात येथे सर्पगंगानदी वाहत होती. ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले.
उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात.
डांगी लोकनृत्याने येथील लोक सणांची रंगत वाढवतात व त्यांची नृत्यकला
जिवंत ठेवतात. पर्यटकांची शहरी संस्कृतीने उबलेली मनं आणि शरिराचा थकवा दूर
करण्याचे पूर्ण सामर्थ्य सापुताऱ्यामध्ये आहे. नाशिकपासून 80 कि.मी.
अंतरावर व मुंबईपासून 250 कि.मी.वर महाराष्ट्र-गुजरात
राज्याच्या गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्यादी पर्वताच्या
रांगांमध्ये सापुतारा समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे.प्रत्येक ऋतुत
सापुतारा तितकंच मनमोहन रूप धारण करतं. सनसेट पॉइण्टपासून ते रोझ
गार्डनपर्यंत अनेक पॉइण्टस् इथे आहेत. तसंच सापुतार्याहून जवळपास असलेली
इतर काही ठिकाणंही पर्यटकांना भावतील अशी आहेत. गुजरातचं एकमेव आणि
प्रसिद्ध हिलस्टेशन म्हणजे सापुतारा. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम
पॅनोरॅमिक व्हू साइट्स असल्याने वर्षभरात पर्यटक तिथे खूप मोठ्या
संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा,
प्रत्येक सीझनमध्ये पर्यटकांना इथलं वाइल्ड लाइफही प्रसिद्ध आहे.
द्राक्षं-स्ट्रॉबेरीची शेती असल्याने ही फळं इथे उत्तम मिळतात. बांबूपासून
बनवलेल्या वस्तू खरेदी करायलाही तिथे एकच झुंबड उडते.
सापुताऱ्यात काय पहाल
सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी सनराईज व सनसेट पॉईंट ही दोन मुख्य
आकर्षणं आहेत. सूर्योदय बघण्यासाठी सनराईज पॉईंटवर पहाटे उठून जावे लागते.
येथून उगवत्या सूर्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. तसेच संध्याकाळी
सनसेटपॉईंटवर असंख्य पर्यटक गर्दी करतात.
काही मिनिटांतच सूर्य
क्षितिजाला टेकतो आणि पर्यटकांचे कॅमेरे धडाधड चालू होतात. काजव्याप्रमाणे
चमकणाऱ्या फ्लॅशच्या लाईटमध्ये सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही.
सनसेटपॉईंटपासून समोरच्या डोंगरावर वैती हॉटेल असून या हॉटेलची दिमाखदार
वास्तू चटकन नजरेत भरते.
या दोन्ही डोंगरांना जोडणारा
रोप-वे या हॉटेलने बसविलेला आहे. हा रोप-वे म्हणजे दोन्ही टोकांना जोडणारी
एक जाड लोखंडी दोरी असून या दोरीवर चार माणसं बसतील अशा छोट्या-छोट्या
केबीन आहेत. या केबीनमध्ये बसून तरंगताना अनोखा अनुभव येतो.
केवळ
चित्रपटांत पहावयास मिळणाऱ्या या रोप-वेमध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना
वैती हॉटेलने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण
आहे. गुजरात टुरिझमने येथे बोट क्लब चालू केला असून सापुताऱ्याच्या
प्रवेशद्वाराशी असलेल्या भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद आपल्याला लुटता
येतो. संथ पाण्यावर नौकेत बसून सफर करत आजूबाजूस सृष्टीसौंदर्य
न्याहाळण्याचे सुख काही औरच असते.
याशिवाय स्टेपगार्डन, बॉटनिकल
गार्डन, गुलाब उद्यान इत्याची बगीचे आहेत. सणावारास व सिझनमध्ये येथील
आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. त्यासाठी खुले नाट्यगृह आहे.
सापुताऱ्याच्या मध्यभागी म्युझियम असून अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास
मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे जिवंत प्राणी येथे असून त्यांची
विविध प्रात्यक्षिके दाखविली जातात. मधमाश्या पाळण्याचे केंद्र येथे असून
शुद्ध मध व मधाची चिक्की येथे विकत मिळते.
‘लॉगहट’ हे संपूर्ण
लाकडात बांधलेले गेस्ट हाऊस उंच डोंगरावर असून वनविभागाच्या अखत्यारित आहे.
तेथून संपूर्ण सापुताऱ्याचे विलोभनीय दर्शन घडते. याशिवाय नागेश्वर मंदिर,
स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, डांगव्हॅली,
ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे आहेत.
स्थळ दर्शनासाठी येथे खाजगी वाहने (कार,जीप इ.) भाड्याने उपलब्ध
आहेत. सापुताऱ्याचं आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे टेबल लॅण्ड पॉईंट.
हा पॉईंट वैती रोप वे रिसॉर्टच्या वरती असून हे प्रचंड मोठे
मैदान सापुताऱ्यात सर्वात उंच ठिकाणावर आहे. येथून सनसेट अतिशय सुरेख
दिसतो. त्यामुळे दुपारनंतर या पॉईंटवर पर्यटकांची खूप गर्दी होते. येथे
घोडेस्वारी, उंटसवारी, एटीव्ही कार्स, घोडागाडी इ. सुविधा पर्यटकांना
आकर्षित करतात. विविध स्टॉल्स असल्याने एकप्रकारचा पिकनीक स्पॉट म्हणून हे
स्थळ लोकप्रिय आहे.
सापुताऱ्याच्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम
पाण्याचे झरे असून याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ‘उन्हाई’ या गुजराथी
शब्दाचा अर्थ मी स्नान केले असा असून राम, लक्ष्मण व सीतामाई वनवासाच्या
काळात या जंगलात आले असता, येथील ऋषी व साधूंना कोडासारख्या त्वचारोगाची
लागण झालेली त्यांना दिसली.
हा रोग नाहीसा करावा असे सीतामाईने रामास
सांगितले. तेव्हा रामाने लक्ष्मणास एक बाण मारण्यास सांगितले. त्याने जेथे
बाण मारला तेथे एक झरा उत्पन्न झाला. हा झरा गरम पाण्याचा होता. ह्या
झऱ्यात ह्या तिघांनी स्नान केले नंतर त्या साधू व ऋषींना आंघोळ करण्यास
सांगितले. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा झाला. अशी
आख्यायिका आहे. या परिसरात कोणालाही त्वचेचा रोग होत नाही असे सांगतात.
ह्या
झऱ्यातून बाराही महिने गरम पाणी येते व त्याचे तापमान 100 सें.ग्रे. इतके
असते. सापुताऱ्यापासून जवळच 6 कि.मी. अंतरावर शिवाजी महाराजांनी बांधलेला
हातगड किल्ला आहे. नाशिक मार्गे सापुताऱ्याला जाताना पन्नास कि.मी. अलीकडे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या
सप्तश्रृंगी देवीचे स्थान लागते. या गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने
गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता
येते.
सापुतार्याहून 50 किलोमीटर्सवर असलेलं बोटॅनिकल गार्डन 24
हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. या गार्डनमध्ये भारतभरातली 1400हून अधिक
प्रकारच्या वेली आहेत. बांबूचेही अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. चायनीज
बांबू, सोनेरी बांबू, बीअर बॉटल बांबू ही इथल्या खास बांबूंची काही
उदाहरणं. सापुतारा-वाघाई रोडवर असलेला गिरा वॉटरफॉल अनुभवण्यासाठी जून ते
नोव्हेंबर या काळात जायला हवं. त्याच्याजवळ असलेल्या आंबापाडा गावात
बांबूच्या विविध वस्तू बनवण्याचं काम चालतं. सापुतार्याहून 70
किलोमीटर्सवर असलेल्या महल जंगलात वन्यजीवन अनुभवता येतं. वर्षातून ठराविक
काळच जाता येऊ शकत असलेल्या या जंगलात जाण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी
लागते. सापुतार्याहून 6 किलोमीटर्स अंतरावर नाशिक रोडवर असलेला हतगड
किल्ला प्रसिद्ध आहे. वणीच्या सप्तश्रृंगी मंदिर इथून अवघ्या 50 किलोमीटर्स
अंतरावर आहे.
कोठे रहाल सापुतारा येथे येणाऱ्या
पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्सपासून थ्रीस्टार हॉटेलपर्यंत विविध पर्याय उपलब्ध
आहेत. विविध सुखसुविधांनीयुक्त हॉटेल्स व धर्मशाळा येथे पर्यटकांच्या
स्वागतासाठी सज्ज आहेत. गुजरात टुरीझमद्वारा सापुतारा येथे तोरण व
सह्याद्री ही हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वैती रिसॉर्ट, चित्रकुट,
पतंग, लॉर्डस्, लेक व्ह्यू, शिल्पी, स्टार हॉलिेडे होम यासारखी अनेक खाजगी
हॉटेल्स वाजवी दरात उपलब्ध आहेत.
सापुतार्यात लो बजेट ते हाय बजेट अशी सर्व प्रकारची हॉटेल उपलब्ध आहेत. होटल आनंदो, सापुतारा (Hotel Anando , Saputara) मानस होमस्टे (Manas Homestay by Sky Stays) होटल लेक व्यू (Hotel Lake View) क्लब महिंद्रा हातगड (Club Mahindra Hatgad) होटल कांसर पैलेस (Hotel Kansar Palace)
जाणार कसे
या
पर्यटन केंद्रास जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड,
बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड (82
कि.मी.) व बिल्लीमोरा (112 कि.मी.) ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत.
रेल्वे मार्गाने :-
सापुतार्यापासून सर्वात जवळचे जंकशन आहे बिलीमोरा तर जवळचे स्टेशन आहे वघई जे ५० कि.मी.लांब आहे.
मुंबई ते सापुतारा 245 किलोमीटर
सूरत ते सापुतारा 160 किलोमीटर
नासिक ते सापुतारा 70 किलोमीटर
विमानमार्गे :-
सापुतार्याला थेट विमानसेवा नाही.मात्र १२० कि.मी.वर सुरत विमानतळ
आहे,जिथून आपण सापुतार्याला येउ शकतो.शिवाय मुंबई एअरपोर्ट २५० कि.मी.वर
आहे.
सापुताऱ्यास कधी जाल सापुतारा हे जरी थंड हवेचे
ठिकाण असले तरी येथील वातावरण संपूर्ण वर्षभर आल्हाददायक असते. म्हणून
वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची
गर्दी सर्वात जास्त असते. होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळ, संक्रांत इ.
सणांना येथे खास उत्सव साजरे केले जातात. पावसाळ्याचा सिझन तर
सापुताऱ्यातील सर्वात नयनरम्य सिझन असतो. ढग, पाऊस व धुक्याचा अनोखा व
अदभूत अनुभव तेथे पर्यटकांना अनुभवयास मिळतो. काश्मिरसारखा अदभूत अनुभव
घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. याशिवाय ट्रेकिंगसाठी
अनेक गड व किल्ले आहेत. म्हणून साहसी पर्यटनालाही येथे मोठा वाव आहे.
त्याच-त्याच पर्यटन स्थळांना भेटी देवून कंटाळलेल्या पर्यटकांना सापुतारा निश्चितच नवा अनुभव देईल.
सापुतारा' म्हणजे नागांचं निवासस्थान
सापुताराचा
अर्थ आहे नागांचं निवास स्थान. सापुताराच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे नाग
आढळून येतात. त्यांना पाहायला अनेक पर्यटक आणि सर्पमित्र सापुताराला भेट
देतात. येथील सर्पगंगा नदीच्या किनाऱ्यावर एक मोठी सापाची प्रतिमा तयार
करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात असतं सापुतारा मान्सुन फेस्टिव्हल
मान्सूनमध्ये
सापुताराचं सौंदर्य आणखी बहरतं. येथे होणाऱ्या पावसामुळे सापुताराच्या
सौंदर्यात भर पडते. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही गीत-संगीत, लोककला आणि
अॅडव्हेंचर अॅक्टिव्हीटीचा आनंद घेऊ शकता.
90 टक्के आदिवासी
निसर्ग
आणि हिरवळ यांमध्ये तुमचं मन रमत असले तर सापुतारा तुमच्यासाठी बेस्ट
डेस्टिनेशन आहे. डांग वनमध्ये असेलेल्या सापुतारामध्ये राहणाऱ्या
लोकांमध्ये 90 टक्के लोकं ही आदिवासी आहेत.
सापुतारा तलाव :-
सापुतारा तलाव हा निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित बांधकामाचे उदाहरण आहे.
सापुतार्याच्या मधोमध असलेला या तलावाच्या बाजुला फुलांनी लगडलेल्या बागा
आहेत.तसेच फिरण्यासाठी पायवाटा आहेत. संपूर्ण सापुताराच निसर्गसौंदर्याने
नटलेलं आहे. पण येथे असलेला सापुतारा तलाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. येथे
येऊन तुम्ही तुमचं सर्व टेंशन विसरून जाल. सापुतारा तलावाच्या शांत
निळ्याशार पाण्यामध्ये बोटींगचाही आनंद घेऊ शकता. यासाठी तलावात पेंडल बोट,
मशीन बोट आणि इतर प्रकाराच्या बोटी आहेत.तसेच तलावाच्या किनार्यावर
मुलांना खेळण्यासाठी खेळणी आणि राइड उपलबध आहेत. पेंडल बोट ४ सिटर, ३००/- ६ सीटर ४५०/- रो-जनरल बोट रुपये ५० /- हाफ राउंड
सापुताराच्या जीवनशैलीला उजाळा देणारे सापुतारा म्युझियम (सापुतारा ट्राइबल म्यूजियम )
सापुतारा म्युझियम येथील जीवनशैली आणि त्याबातची माहीती देते. हे
म्युझियम पर्यटकांना स्थानिकांचे नृत्य, वेशभूषा, परिस्थिती आणि त्यांची
जीवनशैली याबाबत सविस्त माहीती देते.हे संग्रहालय सुरत-नाशिक मार्गावर
आहे.डांग जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या एकंदरीत आयुष्याबध्दल इथे माहिती
दिली आहे.
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ५.३०
प्रवेश फि-२ रुपये प्रतिव्यक्ति
सनसेट्,सनराईज पॉईंट :-
सापुतार्याच्या
पुर्वेला हा पॉईंट असल्यामुळे उगवत्या सुर्याच्या किरणांचा इथे आनंद घेता
येतो.तसेच सापुतार्यात 'सनसेट पॉईंट' देखील आहे जिथे सुर्यास्ताचा आनंद
घेता येतो. मात्र या दोन्ही पॉईंटवर जाण्यासाठी डोंगराची चढाई करावी लागते.
Gira water falls
गिरा वॉटरफॉल :-
सापुतार्यापासून ५० कि.मी.दुर वाघाई कसब्यात ( आंबावाडा व्हिलेज ) इथे
हा धबधबा आहे.वासंदा नॅशनल पार्क इथून केवळ ३ कि.मी. आहे.घनदाट जंगल आणि
डोंगराने वेढलेल्या दरीत हा धबधबा आहे.पावसाळ्यात हा धबधबा एन भरात
असतो.सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपण या परिसराला भेट देउ शकतो.इथे
वाहनाच्या पार्किंगची सोयही आहे आणि प्रति वाहन ५०/- रुपये भाडे द्यावे
लागते.
EcoSite camp
पूर्णा वन्यजीव अभयारण्य सापुतारा :-
महाराष्ट्र
आणि गुजरात यांच्या सीमावर्ती भागात १६५ कि.मी. परिसरात पसरलेले पुर्णा
वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा तर गुजरातमधील
डांग्,तापी,व्यारा आणि अहवा या जिल्ह्यात मिळून पसरलेले आहे.मात्र या
अभयारण्याचे नियंत्रण गुजरातच्या डांग फॉरेस्ट डिपार्टमेंट्कडे आहे.या
वनातून वहाणार्या पुर्णा नदीच्या नावावरुन अभयारण्याला नाव दिले गेले
आहे.या जंगलात बिबटे,तरस्,कोल्हे,चौसिंगा, अजगर, बार्किंग डिअर असे वन्य
प्राणी बघायला मिळतात. तसेच या परिसरात कोकण, कोल्चा,डंबडास्,वारली असे
आदिवासी समुदाय निवास करुन आहेत.आजही हे आदिवासी त्यांच्या पारंपारीकता जपत
या वनात अधिवास करुन आहेत.इको कँपसाईटवर आपण देखील त्यांच्यासारख्या
जीवनशैलीत राहून अनुभव घेउ शकतो. वास ट्रिहाउस्,ट्रेकिंग अश्या साहसी
खेळाचा इथे आनंद घेता येतो. या जंगलात टेक्टोना ग्रैंडिस (टीक),
डेंड्रोकलामस कड़े आणि राइटिया टेंक्टोरिया (दुधला) अश्या जवळ्पास सातशे
वनस्पती बघायला मिळतात. वेळः- सकाळी ६ ते संध्याकाळी ५ प्रवेश फि- 20 रूपये प्रति व्यक्ति
नागेश्वर महादेव मंदिर सापुतारा :-
सापुतारा
तलावाच्या दक्षिण बाजुच्या किनार्यावर असलेले नागेश्वर मंदीर हे
सापुतार्यातील एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे.भारतातील बारा
ज्योतिर्लिंगापैकी एक असे याला महत्व आहे,हे इथल्या स्थानिक लोकांचे मत
आहे.दररोज इथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र शिवरात्रीला इथे विशेष
गर्दी असते. वेळः- सकाळी ६ ते संध्याकाळी ६ प्रवेश शुल्कः- निशुल्क
इको पॉइंट - Eco point सापुतार्याच्या
मेन सर्कलपासून साधारण दिड कि.मी.वर एक मोठा डोंगर आहे.इथे खड्कांची
नैसर्गिक रचना अशी आहे कि आपण मोठ्याने ओरडलो कि त्याचा प्रतिध्वनी
आपल्याला एकु येतो. सहाजिकच इथे जो कोणी येतो तो ओरडून आपली हौस पुर्ण
करतोच. सापुतार्याच्या सहलीत आपण हा एको पॉईंट, लुइसा पॉईंट, किंग जॉर्ज
पॉईंट या सर्व पॉईंटची सैर करु शकता. वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ७ प्रवेश फि- मोफत
स्टेप गार्डन सापुतारा –
सापुतार्याला
भेट दिल्यावर आवर्जून बघायच्या ठिकाणापैकी एक म्हणजे स्टेप गार्ड्न्,हि
बाग पायर्यांच्या रचनेची बनवली आहे.जसजसे आपण पायर्या चढत वर जाउ तसतसे
आपल्याला बागेत लावलेली विवीध फुले आणि झाडे आकर्षित करुन घेतात. या बागेत
मुलांना खेळण्यासाठी स्पोर्ट एरिया आहे, जिथे मुले मनसोक्त मस्ती करु
शकतात. यामुळे सहकुटूंब भेट द्यावी अशी सापुतार्यातील एक जागा म्हणता
येईल.
वेळः- सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७
प्रवेश फि- 10 रूपये प्रति व्यक्ति
आर्टिस्ट विलेज :-
पर्यटक असण्याबरोबरच कला आणि सांस्कृतिक घडामोडीत आपल्याला रुची असेल तर
सापुतारा भेटीत या आर्टीस्ट व्हिलेजला नक्की भेट द्या. हे गाव म्हणजे जणू
कलाकारांचे संमेलनच.इथे वारली चित्र, भिल्ल्,कुणबी या आदिवासींनी केलेल्या
कलाकृती पहायला मिळतात. ललित कलेचे अभ्यासक इथे आदिवासी कलेतील बारकावे
शिकायला येतात.पर्यटक म्हणून आपण आदिवासी बांधवांनी बनवलेल्या वस्तु खरेदी
तर करु शकतोच पण इच्छा असेल तर या वस्तु बनवण्याच्या कार्यशाळेत भाग घेउ
शकतो.
रोज गार्डन :-
सापुतार्याच्या
मुख्य चौकापासून सनराईज रोडवर केवळ ६०० मीटर अंतरावर हे रोज गार्डन
आहे.याची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी आहे.या बागेत जवळपास २०० पेक्षा
जास्त गुलाबाच्या जाती बघायला मिळतात.अर्थात इथे गुलांबाशिवाय इतरही
अनेकप्रकारची झाडे बघायला मिळतात.सापुतार्याच्या भेटीत न चुकवावे असे हे
ठिकाण.
वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ६
प्रवेश शुल्कः- मोफत
पांडव गुंफा सापुतारा :-
सापुतार्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपकी पांडव गुंफा हे एक महत्वपुर्ण
स्थान आहे. इतिहास आणि पौराणीक घडामोडीत रस असणार्या पर्यटकांना या गुंफा
आकर्षीत करुन घेतात. या गुंफाना अरवलम गुहा असेही म्हणतात. वनवासाच्या
काळात पांडव काहीकाळ इथे विश्रांतीसाठी राहिले होते अशी मान्यता आहे. या
गुहापर्यंत जाण्यासाठी कच्च्या पायवाटेवरुन ट्रेकींग करत जावे
लागते.अर्थातच हा अनुभव साहसी आहे.
वाघई बॉटनिकल गार्डन सापुतारा:-
२४ हेक्टरमध्ये पसरलेले वाघई बोटॅनिकल गार्ड्न गुजरातमधील मोठ्या
उद्यानापैकी एक आहे. पर्यटक जेव्हा या बागेला भेट देतात तेव्हा इथल्या
जवळपास १४०० प्रकारच्या झांडाचे वैवीध्य पाहु शकतात. या बागेत बांबुचे बरेच
प्रकार आहेत्,त्यात चिनी बांबु आणि बियर बोतल बांबु हे विशेष आहेत.या
बागेची विशेषत म्हणजे इथल्या प्रत्येक रस्त्याचे नाव झाडावरुन ठेवण्यात आले
आहे.सापुतार्याच्या भेटीत आवर्जून जावे असे ठिकाण म्हणजे हे वाघई गार्डन.
वेळः सकाळी ८ ते संध्याकाळी ६
रोप-वे सापुताराचे नवीन आकर्षण
जर आपण सहकुटूंब सापुतारा परिसराची सहल करत असलो तर रोप वेला भेट देउन
त्यातून दिसणारा नजारा नक्कीच पहावा. हा रोप वे सनसेट पॉईंटपासून सुरु होउन
गव्हर्नर हिलजवळून सनराईज पॉईंटपर्यंत घेउन जातो. या रोपवेतून पर्यटक
जवळपास ३० फुट उंचीवरुन सापुतार्याचे दृष्य बघत असतात.
वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०
फि- 62 रूपये प्रति व्यक्ति
सापुतारा एडवेंचर पार्क :-
खासकरुन साहसी खेळांची आवड असणार्या तरुणांसाठी सनसेट पॉईंटजवळ
गव्हर्नर हिलजवळ सापुतारा अॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे.इथे सकाळी ८
ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रॉक क्लायबिंग, झिप लाईन अश्या साहसी खेळांचा
आनंद घेता येतो. इथे जाण्यासाठी आपल्याला टेबल पॉईंटपर्यंत जावे लागते,इथे
पॅराग्लायडींगहि केले जाते.मात्र पावसाळ्याच्या काळात पॅराग्लायडींग बंद
असते.
टेबल व्यू पॉइंट -
सापुतारा सर्कलपासून ४ कि.मी.दुर असलेल्या टेबल व्ह्यु पॉईंटला गव्हर्नर
हिल या नावाने देखील ओळखले जाते.सापुतार्यातील हि सर्वोच्च उंचीची टेकडी.
इथून पुर्ण सापुतार्याचे दृष्य बघता येते. या टेकडीवर सपाटी आहे.त्यामुळे
याचा आकार एखाद्या टेबलासारखा आहे.या पठारावर हॉर्स रायडींग, कॅमल रायडींग,
बाईक राइंडींग्,फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग केले जाते.इथे मक्याची कणसे
आणि स्ट्रॉबेरीचा आस्वादही घेता येतो.
हनी बी सेंटर
सापुतार्याच्या भेटीत आणखी एक भेट दिले पाहिजे असे ठिकाण म्हणजे हे
हनी सेंटर. इथे पोळ्यातून मध कसे काढले जाते हे पहायला मिळते.तसेच
नैसर्गिक शुध्द आणि भेसळ नसलेला खात्रीशीर मध खरेदी करता येतो.
सापुतारा सबरीधाम :-
सापुतार्यापासून ६० कि.मी.वर शबरीधाम आहे.या धार्मिक स्थळी मनाला एकदम
शांत वाटते.पौराणीक कथेनुसार भिल्लीण वृध्दा शबरी श्रीरामाची भक्त होती.
याच जागी शबरीने आपली उष्टी बोरे श्रीरामांना खाउ घातली.इथून काही अंतरावर
पंपा सरोवर आहे जिथे शबरी आणि हनुमानाने स्नान केले होते.इथेच परिसरात
मातंग ऋषींचा आश्रम आहे जे शबरीचे गुरु मानले जातात.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.