छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याची स्थापना करण्यात आली. छत्तीसगडच्या सीमा वायव्येस मध्य प्रदेश, पश्चिमेस महाराष्ट्र, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पूर्वेस ओरिसा, ईशान्येला झारखंड आणि उत्तरेस उत्तर प्रदेश या राज्यांच्या सीमा आहेत. रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे, छत्तीसगड हे भारतातील १० व्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ १३५,१९० चौरस किमी (५२,२०० चौरस मैल) आहे. राज्याचा उत्तर आणि दक्षिण भाग डोंगराळ आहे, तर मध्य भाग हा सुपीक मैदानी आहे. पूर्वेकडचा डोंगराळ भाग पानझडी जंगलांनी राज्याचा ४४ टक्के भाग व्यापला आहे. उत्तरेला गंगेच्या काठावरचा मैदानी प्रदेश आहे. गंगेची उपनदी रिहंद नदी या भागातून वाहते. सातपुडा पर्वतरांगेचे पूर्व टोक आणि छोटा नागपूर पठाराचा पश्चिम किनारा यामुळे डोंगरांचा पूर्व-पश्चिम पट्टा तयार होतो जो महानदी नदीच्या खोऱ्याला गंगेच्या मैदाना प्रदेशापासून विभागतो. राज्याचा मध्य भाग महानदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा असून सुपीक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भातशेती आहे. वरच्या महानदीचे खोरे वरच्या नर्मदा खोऱ्यापासून पश्चिमेला मैकल टेकड्यांद्वारे (सातपुरांचा भाग) आणि ओरिसाच्या मैदानापासून पूर्वेकडे टेकड्यांच्या रांगांनी वेगळे केले आहे. राज्याचा दक्षिणेकडील भाग दख्खनच्या पठारावर, गोदावरी नदी आणि तिची उपनदी, इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. महानदी ही राज्याची प्रमुख नदी आहे. हसदो (महानदीची उपनदी), रिहंद, इंद्रावती, जोंक, अर्पा आणि शिवनाथ या इतर मुख्य नद्या आहेत. २५.५ दशलक्ष लोकसंख्या असलेले छत्तीसगड हे देशातील १६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. हे राज्य भारतासाठी वीज आणि स्टीलचा एक मोठा स्त्रोत आहे, देशातील एकूण स्टील उत्पादनापैकी १५% वाटा आहे.






छत्तीसगडचे हवामान उष्णकटिबंधीय आहे. हे राज्य कर्कवृत्तावर असलेल्या उष्ण कटिबंधा प्रदेशात असल्यामुळे आणि पावसासाठी मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे ते उष्ण आणि दमट आहे. छत्तीसगडमध्ये एप्रिल ते जून पर्यंत उन्हाळा असतो आणि तापमान ४८°C (१००°F) पर्यंत पोहोचते. मान्सूनचा हंगाम जूनच्या अखेरीस ते ऑक्टोबरपर्यंत असतो. छत्तीसगडमध्ये सरासरी 1,292 मिलिमीटर (50.9 इंच) पाऊस पडतो. नोव्हेंबर ते जानेवारी हिवाळा असतो आणि छत्तीसगडला भेट देण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कमी तापमान आणि कमी आर्द्रता यामुळे हिवाळा आनंददायी असतो. उन्हाळ्यात तापमान 30 ते 47°C (86 आणि 117°F) आणि हिवाळ्यात 5 ते 25°C (41 आणि 77°F) दरम्यान असते. तथापि, 0°C ते 49°C पेक्षा कमी तापमानातील कमालीची नोंद केली जाऊ शकते.
छत्तीसगडमध्ये ३३ प्रशासकीय जिल्हे आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांमधून नवीन जिल्हे तयार केले गेले आहेत. या जिल्ह्यांना सुकमा, कोंडागाव, बालोद, बेमेटारा, बालोदा बाजार - भाटापारा, गरिआबंद, मुंगेली, सूरजपूर, बलरामपूर आणि गौरेला - पेंद्रा - मारवाही अशी नावे देण्यात आली आहेत.



राज्याची अधिकृत भाषा हिंदी आहे. ओडिया, मराठी, तेलगू देखील बोलले जाते.
इथे लोकसभेचे सदस्य ११ खासदार (राज्यसभेच्या जागा ५).
विधिमंडळ एकसदनी (९० जागा).
विमानतळ - स्वामी विवेकानंद विमानतळ, रायपूर
प्रमुख शहरे:- रायपूर, बिलासपूरदुर्ग, भिलाई, राजनांदगाव, चिरमिरी, महासमुंद, धमतरी, रायगड, अंबिकापूर, जगदलपूर
सण :-बस्तर दसरा/ दुर्गा पूजा, बस्तर लोकोत्सा, मदई उत्सव, राजीम कुंभ मेळा, पाखंजोर मेळा (नारा नारायण मेळा), भोरमदेव उत्सव, गोंचा उत्सव, तीजा उत्सव, चंपारण मेळा
प्रमुख लोकनृत्य:- पंथी, रावत नाच, पांडवाणी, चैत्र, काकसार, सायला आणि सूवा
प्रमुख नद्या :- महानदी, गोदावरी, गंगा, नर्मदा. महानदी ही या राज्याची जीवनरेखा आहे.
प्रमुख खनिजे :-लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, कोळसा, बॉक्साईट, कोरंडम, गार्नेट, क्वार्ट्ज, संगमरवरी, हिरा
पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाणे :- भोरमदेव मंदिर, अर्जुनाचा रथ, शदानी दरबार (रायपूर), श्री राजीव लोचन मंदिर (रायपूर), लक्ष्मण मंदिर (महासमुंद), पाशर्वनाथ तीर्थ (दुर्ग)
छत्तीसगडाच्या खाद्यसंस्कृतीत मोठ्या प्रमाणात तांदुळ, बाजरी, ज्वारी यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याचा वापर करुनच छत्तीसगडमधील खाद्यपदार्थ तयार केले जातात. अर्थात छत्तीसगडच्या खाद्यसंस्कृतीवर शेजारी असलेल्या बिहार, ओरीसा, महाराष्ट्र या राज्यांचा प्रभाव पडला आहे. इथे भोजनात जिलेबी, पेठा यांचा समावेश होतो. मका, ज्वारी,गहु यांचा मोठ्या प्रमाणात होतो. चण्याच्या डाळीचा वापर करुन केलेली बाफोरी, काजु बर्फी, साबुदाणा खिचडी, कोहळा, हे इथले लोकप्रिय पदार्थ. अर्थात छत्तीसगडमधील हॉटेलमध्ये स्थानिक पदार्थाबरोबरच बाहेरच्या राज्यातील खाद्यपदार्थ उपलब्ध असतात.
 |
बाजारातले भाज्यांचे ठेले
|
बस्तरचा बाजार चांगलाच फुललेला असतो. भज्यांचे ठेले असतात. एकीकडे सुक्या मासळीचे ठेले होते. तर पलीकडे रानभाज्या विकायला ठेवल्या होत्या. फळफलावळ आणि नेहमीच्या भाज्या वगैरे होत्याच. इथल्या रानातले मुख्य उत्पन्न म्हणजे तेंदूपत्ता आणि महुआ. महुआच्या फुलांपासून दारूही बनवतात. मात्र त्याचा सीझन उन्हाळ्यात असतो. ठेल्यावर वाळवलेली महुआची फुलेही दिसतात. खजूर किंवा मनुकांसारखी त्यांची चव असते. याशिवाय मोठ्या हंड्यांमध्ये सल्फी – म्हणजे ताडाच्या पानांपासून बनवलेली दारू विकली जाते. त्याची चव आंबट-गोड आणि थोडीशी झणझणीत अशी असते.याशिवाय भातापासून बनवलेली बियर सुध्दा विकली जाते.. आंबट दह्यामध्ये भाताची पेज मिसळावी तशी काहीशी त्याची चव असते. याने पोट एकदम साफ होतं म्हणे.
 |
वाळवायला ठेवलेल्या लाल मुंग्या
|
बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी वर्ज्य नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे पदार्थ जेवणात समाविष्ट केले जातात. शिवाय चिंचेची आंबट-गोड चटणीही असते. याशिवाय बस्तर मधली प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी. असंख्य मुंग्या आणि त्यांची अंडी पानावर उन्हात वाळवत स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या असतात.

भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती :-
छत्तीसगड येथील जंगल अजूनही घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत व येथे अप्रतिम व भव्य धबधबे पाहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण, या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या, तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या, यांच्या कचाट्यात सापडला आहे. ब्रिटिशांच्या काळापासून चालू असलेल्या शोषणाने येथील आदिवासी नाडला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाले तरीही, बस्तर आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार या मूलभूत सुविधांपासून अजूनही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. बस्तरमधील सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे जिल्हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहेत. येथील दूरच्या गावांमध्ये सतत काहीना काही घडामोडी होत असतात. काही गावे पूर्णपणे नक्षलींच्या ताब्यात असतात, त्यांच्या परवानगीशिवाय तिथे ये-जा करायला प्रतिबंध असतो. अनेक गावे अशी आहेत की, जिथे दिवसा आपण जाऊ शकतो, परंतु रात्री नाही. अशा गावांमध्ये जायचे असते, तेव्हा आधी गावकर्यामार्फत नक्षली लोकांना निरोप पाठवून त्यांची परवानगी घ्यावी लागते, मगच जाता येते. येथील लोकांची रेशनकार्ड, आधारकार्ड त्यांनी जाळून टाकले असल्याने, लोकांना रेशनचे धान्य विकत घ्यावे लागते. त्यांना अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. अनेकदा एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्या, तरी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जायला लवकर परवानगी दिली जात नाही. कारण, नक्षली लोकांना नेहमी भीती असते की, गावातील लोक त्यांची खबर पोलिसांना देतील.

बहुतांश आदिवासी लोक जंगलात छोट्या छोट्या, दूरवर वसलेल्या गावात राहातात. जी आतली गावे आहेत, तिथे अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी गर्भवती स्त्री कित्येक किलोमीटर चालून, जंगल पार करून मुख्य रस्त्यापर्यंत येते, तेथून मग तिला वाहन मिळते. कित्येक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा प्रसूती वेदना सुरू झालेल्या स्त्रीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी खाट उलटी करून तिची डोली बनवली जाते आणि त्यातून रुग्णाला खांद्यावर वाहून नेले जाते. पावसाळ्यामध्ये आणखी समस्या निर्माण होते. कारण, अनेक नद्या-नाले असलेल्या या प्रदेशात जास्त पाऊस होतो, तेव्हा रस्ते बंद होऊन जातात आणि गाव इतर गावांपासून तुटते. अनेकदा अशा परिस्थितीत रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाही आणि उशीर झाल्याने रूग्णाची स्थिती गंभीर होते. रुग्णवाहिका चालवणारे लोक अनेकदा धाडस करून नदी नाल्यांना पूर असतांना पाण्यातून गाडी चालवतात आणि रुग्णाला घेऊन येतात. एखादी अडलेली प्रसूती असेल, तर बर्याचदा ती गर्भवती स्त्री रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप वेळ लागल्याने तिचे गर्भाशय फुटते व तिच्या जिवाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात अशा केसेस नेहमीच येतात.

इथे जिल्ह्याच्या आजूबाजूची जी गावे आहेत, तिथे आठवड्यातील एक दिवस बाजार भरतो, त्याला हाट बाजार म्हणतात. या बाजारात दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू भेटतात. म्हणजे किराणा, फळे, भाज्या, चप्पल, कपड्यांपासून शेतीत लागणारी खते, बियाणे, मातीची व धातूंची भांडी, खोटे दागिने, मासे पकडायचे जाळे इत्यादी सर्व. शिवाय, काही ठिकाणी शिवणकाम करणारा टेलरही त्याची शिलाई मशीन घेऊन बसलेला असतो. जंगलातील विविध कंदमुळे येथे पाहायला मिळतात. तसेच, नदीत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासेही पाहायला मिळतात. इथे ‘सुक्शी’ नावाचा प्रकार लोकांचा खूप आवडता आहे. सुक्शी म्हणजे ऊन्हामध्ये सुकवलेले मासे. रोजच्या भाजीमध्ये किंवा वरणात ही सुक्शी चव येण्यासाठी वापरली जाते. बाजाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे अजूनही वस्तूविनिमय चालतो. म्हणजे आदिवासी लोक आपल्याकडचा काही माल, उदाहरणार्थ गोळा केलेली चिंच, महुआ देऊन, त्या बदल्यात दुसरा माल घेतात, बर्याचदा त्यांना बदल्यात मीठ दिले जाते. बाजाराचे आणखी एक आकर्षण म्हणजे, स्थानिक मद्ये. बस्तरमधील विविध मद्ये खूप लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत. महुआच्या फुलांपासून बनवलेले महुआ हे मद्य, सल्फीच्या खोडातून ताज्या रसासारखी मिळणारी ‘सल्फी’, खजुराच्या झाडाचा ‘छिंदरस’, तांदळापासून बनवला जाणारा ‘लांदा’, ‘ताडी’. बाजाराच्या एका बाजूला अनेक बाया मोठ्या हंड्यांमध्ये, काही बाटल्यांमध्ये ही मद्ये घेऊन बसलेल्या दिसतात. झाडाच्या पानाच्या द्रोणामध्ये मद्य दिले जाते. आदिवासी भागात मद्यपान हे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांपासून म्हातार्या लोकांपर्यंत सर्व कुटुंबीय एकत्र बसून मद्याचा आस्वाद घेतात. प्रत्येक सणाला किंवा लग्न वा इतर घरगुती कार्यक्रमात घरीच ही ताजी मद्य बनवली जातात आणि दिवसभर पाहुण्यांना दिली जातात. तुम्ही जर गावात कोणाच्या घरी जेवायला गेलात, तर सुरुवातीला पाहुणचार म्हणून ‘महुआ’ किंवा ‘सल्फी’ किंवा ‘लांदा’ दिला जातो. ते न पिणे म्हणजे, त्यांना अपमान वाटतो.

येथील खानपानामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहायला मिळते, ते म्हणजे ‘चापडा’ चटणी. ही लाल मुंग्यांची चटणी असते. मुले जंगलात फिरताना झाडावर चढून लाल मुंग्या शोधून भांड्यात गोळा करतात. बाजारात सुद्धा मोठ्या पानावर असलेल्या लाल मुंग्या आणि त्यांची अंडी विकत मिळतात. लाल मुंग्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मलेरिया बरा होतो, असा इथे समज आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी, पक्षी आदिवासी भागात खाल्ला जातो. अनेकदा रस्त्याने जाताना गलोर किंवा कधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघालेले आदिवासी तरुण पहायला मिळतात. मध्ये दंतेवाडामध्ये प्रशासनाने एक आवाहन केले की, गलोर सोडून द्या आणि पक्ष्यांची, छोट्या प्राण्यांची शिकार थांबवा. इथे उंदीरसुद्धा आगीत भाजून खूप आवडीने खाल्ले जातात. बारसुरजवळ अबुजमाड नावाचा मोठा डोंगराळ भाग आहे. अबुज नावाचा अर्थ अनाकलनीय. हा भाग म्हणजे नक्षली लोकांचा बालेकिल्ला समजला जातो. येथे अजूनही प्रशासन पोहोचू शकले नाही. इथे जाणे धोकादायक असून, नक्षली लोकांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही की, तेथून बाहेर येऊ शकत नाही. वर्षातून महाशिवरात्रीच्या 1-2 दिवशी मात्र येथे प्रवेश करायला पूर्ण परवानगी असते. येथे आतमध्ये, बारसुरपासून 25 किमी आत घनदाट जंगलात ‘तुलार गुफा’ आहे, जेथे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गुहेसमोर आदिवासी पारंपरिक वेशभूषेमध्ये संगीताच्या तालावर नृत्य करतात. या गुहेला भेट देणे म्हणजे, एकदम अश्मयुगाची आठवण करणारा थरारक अनुभव आहे. हा भाग पाहिल्यावर लक्षात येते की, याचे ‘अबुजमाड’ हे नाव अगदी सार्थ आहे.
आपल्यापेक्षा भिन्न असलेले, अजूनही जुन्या चालीरीती सांभाळणारे हे आदिवासी विविध अन्यायाने, शोषणाने दबून गेले आहेत. येथील जंगलात खनिजांचे मोठाले साठे आहेत. त्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या जमिनी बळकावतात आणि आदिवासींची घरे असलेली जंगले उद्ध्वस्त केली जातात. जो आदिवासी जंगलाचा राजा असतो, तो खाणीमध्ये मात्र कमी पैशावर राबणारा मजूर बनून उरतो. खाणीमध्ये काम केल्याने फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य कमी होते. या कंपन्यांच्या विरोधात आदिवासींचा आवाज सरकारकडून दाबला जातो. यामुळेही अनेक तरुण-तरुणी नक्षली चळवळीकडे खेचले जातात. काश्मीरनंतर सर्वात जास्त लष्कर छत्तीसगडमध्ये आहे. लष्कराने व्यापलेल्या भागात नागरिकांचे विविध प्रकारे शोषण होते, जसे की, नक्षल असल्याच्या संशयावरून अनेक निष्पाप आदिवासींना तुरुंगात डांबले जाते. केस लढवायला, वकील द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. कित्येक वर्षे, कुठल्याही पुराव्याशिवाय आदिवासी केवळ संशयावरून तुरुंगात खितपत पडतात. खोटी चकमक दाखवून अनेक निर्दोष आदिवासींना मारले जाते आणि नंतर त्यांना नक्षल म्हणून घोषित केले जाते. 2012 साली जून महिन्यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील सारकेगुडा या गावात आदिवासींचा सण बीजपंडुम साजरा होत होता. रात्रीच्या वेळी गावकरी एकत्र जमून लोकल दारूचा स्वाद घेत नृत्य-गाणे चालू होते. कोणाकडेही कसलेही शस्त्र नव्हते. पोलिसांनी अचानक येऊन या निशस्त्र जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. यात एकूण 17 आदिवासी, ज्यात 7 अल्पवयीन मुलेही होती. यात दहावीमध्ये शिकणारा, शाळेत प्रथम आलेला व शासनाने पाठ थोपटलेला गुणवंत आदिवासी विद्यार्थी होता. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रात मोठ्या बातम्या आल्या की, पोलिसांनी कुख्यात नक्षलवाद्यांना मारले. आदिवासी लोकांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात न्यायालयीन लढाई चालवली. त्यात अनेक मानवी अधिकारवाल्यांनी त्यांना मदत केली. आशुतोष भारद्वाज या ‘इंडियन एक्स्प्रेसच्या’ पत्रकाराने मृत आदिवासींच्या पोस्टमार्टेमचे पुरावे गोळा केले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, मारले गेलेले हे आदिवासीच होते, नक्षलवादी नव्हते. अशा खोट्या एनकाऊंटरच्या घटना इथे नेहमी घडत असतात. स्त्रियांवर, शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार होतात. अत्याचार करून कधी त्या मुलीला वा स्त्रीला मारून टाकले जाते व नंतर नक्षलवादी म्हणून घोषित केले जाते. या आदिवासींच्या बाजूने जे कोणी उभे राहील, त्या व्यक्तीला सतत पोलिसांची भीती राहते. तरीही, काही मानवाधिकार कार्यकर्ते इथे जिद्दीने आदिवासींसाठी काम करतात,
बस्तरचा दसरा :-
बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. बस्तर दशेरा मात्र संपूर्ण वेगळा आहे. रामाने वनवासातली दहा वर्षे दंडकारण्यात, म्हणजेच आजच्या बस्तरमधल्या रानात, व्यतित केली असली तरी इथल्या दसऱ्याच्या उत्सवाचा रामायणाशी काहीच संबंध नाही. या उत्सवाचे मूळ इथल्या इतिहासात आहे. या संपूर्ण प्रदेशावर काकतीय राजांचे राज्य होते. काकतीय राजे मूळचे तेलंगणातील वारंगळचे. दिल्लीच्या सुलतानशाहीने त्यांचा पाडाव केल्यानंतर तत्कालीन राजा आपल्या कुटुंबासोबत इ.स. १३२४ मध्ये दंडकारण्यात पळून आला. अत्यंत घनदाट आणि दुर्गम अरण्याने वेढलेल्या त्या प्रदेशात त्याने आपले राज्य स्थापले. सोबत त्याने आपली कुलदेवता आणली, तीच दांतेश्वरी. काकतेय राजांनी या दुर्गम प्रदेशावर १९४७ पर्यंत राज्य केले. या काळात राजांनी आणलेली वैदिक संस्कृती आणि स्थानिक आदिवासी संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडून आला. बस्तर दशेरा म्हणजे याचेच फलित होय.
बस्तरच्या वेगवेगळ्या गावांतून जमलेले लोक आणि त्यांच्या ग्रामदेवता
या उत्सवाची सुरुवात झाली १५ व्या शतकात, जेव्हा काकतीय राजे पुरुषोत्तम देव जगन्नाथपुरीहून रथावर आरूढ होण्याची दैवी परवानगी घेऊन बस्तरला आले. ती घटना साजरा करण्याची मग प्रथाच पडून गेली. अनेक स्थानिक परंपरा मग या उत्सवाशी जोडल्या गेल्या. हा उत्सव एकूण ७५ दिवस चालतो. श्रावण अमावास्येला, जिला हरियाली अमावस म्हणतात, या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी रथ बांधण्यासाठी रानातून लाकूड आणले जाते. या प्रथेला म्हणतात पटजत्रा. मग रथांचे बांधकाम, सजावट, वगैरे कामं वेगवेळ्या जमातींचे लोक करतात. उदाहरणार्थ, बेडा उमरगांव गावचे सुतार दुमजली रथ बांधतात तर कारंजी, केसरपाल, आणि सोनाबल गावचे लोक रथ ओढण्याचे दोरखंड वळतात. पोटनार गावचे मुंडा लोक लोकगीते गातात. या सगळ्या प्रथा गेली कित्येक शतके अखंडित सुरु आहेत. एकदा रथाचे बांधकाम झाले की नवरात्रीच्या सुमारास रथपरिक्रमा सुरु होते. पहिल्या दिवशी म्रिगन जमातीतल्या एका लहान मुलीला देवीस्वरूप मानून तिच्याकडून परिक्रमा सुरु करण्याची आज्ञा घेतली जाते. या प्रथेला काछ्न गाडी म्हणतात. मग देवीची मूर्ती रथामध्ये बसवून रथ जातात. त्यादरम्यान आसपासच्या प्रदेशांतले असंख्य लोक त्यांच्या स्थानिक देवतांना घेऊन जगदालपूरला येतात. मुख्य रथांच्या आजूबाजूने आपल्या देवतांना फिरवतात. सारे वातावरण मांगल्याने आणि उत्साहाने भरलेले असते. प्रत्येक जमातीचा पारंपरिक पोशाख, त्यांच्या देवतांच्या विशिष्ट मूर्ती, त्यांचे लोकसंगीत या सगळ्याचे अनोखे प्रदर्शन या उत्सवात घडते.
पारंपरिक वाद्ये
जगदालपूर शहराच्या मध्यवर्ती भागात दांतेश्वरी मंदिर आहे. सगळा परिसर गर्दीने गजबजतो. मंदिराच्या बाहेरील चौकात एक फुलांच्या माळांनी सजवलेला भलामोठा दुमजली रथ उभा केला जातो. रथावर शिरोभागी देवीची मूर्ती स्थानापन्न केली जाते. रथाची रचना साधीच होती. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या रचनेत कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता. केवळ लाकडाने बांधलेला तो प्रचंड रथ ओढण्याचे काम मारिया जमातीतले जवळपास ४०० लोक अत्यंत भक्तिभावाने करतात. एकदा ओढायला सुरुवात केली की काही मीटर अंतर रथ पुढे जाई आणि थांबे. मग माणसे बदलली जात. मग पुन्हा हाईसा म्हणत ओढायला सुरुवात. त्याशिवाय आजूबाजूच्या गावांतून आलेले लोक त्यांच्या ग्रामदेवतांना लहान पालख्यांवर बसवून फिरवत होते. या पालख्या अत्यंत वेगात पळवल्या जातात. त्यांना पळवणारे कुठल्याशा धुंदीत असतात. या पालखीच्या खालून जाणे भाग्याचे मानले जाते. वेगात पाळणाऱ्या पालख्या, त्यांच्या खालून जायचा प्रयत्न करणे स्थानिक तरुण, त्या चढाओढीत होणारी पडापड, असे सगळेच दृश्य गमतीशीर होते.पालखीचा दांडा फारच जोरात लागतो म्हणे. यासाठी पालख्यांच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

स्थानिक ग्रामदेवतांच्या पालख्या
फुलांच्या माळांनी सजवलेला रथ
बर्याचदा हा रथ चोरीला जातो आहे! त्याची कथा सुद्धा गमतीदार आहे. जेव्हा हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा प्रत्येक जमातीला काही ना काही काम मिळाले. पण माडिया जमातीला काहीच काम मिळाले नाही. म्हणून त्यांनी एका रात्री देवीचा रथच चोरून नेला. अखेर खुद्द राजाला त्यांच्याकडे जाऊन रथ परत करण्याची विनंती करावी लागली. बऱ्याच वाटाघाटीनंतर राजाला त्या जमातीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि मगच रथ मंदिरात परत आला. आता ही घटनाही परंपरेचा एक भाग बनली आहे. रथ चोरीला जाताना मुद्दामहून सगळ्या शहरातले दिवे घालवले जातात. सगळे व्यवसाय-धंदे बंद केले जातात. सारे शहर रथ चोरीला जाताना बघते आणि ‘चोरांना’ प्रोत्साहनही देते!
 |
| अंधारात रथ ओढणारे लोक |
उत्सवाची सांगता ‘मुरीया दरबार’ ने होते. यात राजा सगळ्या जमातींच्या नेत्यांना भेटतो, त्यांच्या मागण्या ऐकतो आणि काही पूर्णही करतो. आजही हा परंपरागत दरबार भरतो. राजाच्या जागी छत्तीसगढचा मुख्यमंत्री लोकांच्या मागण्यांचे निराकरण करतो. परंपरेला मिळालेली ही आधुनिकतेची जोड प्रशंसनीयच म्हणायला हवी.
बस्तरचा इतिहास :-
बस्तर हा छत्तीसगड राज्यातील जिल्हा आहे. बस्तर जिल्ह्याचे आणि बस्तर विभागाचे मुख्यालय जगदलपूर आहे. ते दक्षिण कौशल म्हणून ओळखले जात असे. घनदाट जंगले आणि आदिवासी संस्कृतीसाठी हा प्रदेश ओळखला जाते, त्यामुळे याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. ६५९६.९० चौ.कि.मी.मध्ये पसरलेला हा जिल्हा एकेकाळी केरळसारख्या राज्यापेक्षा आणि बेल्जियम, इस्रायलसारख्या देशांपेक्षा मोठा होता. जिल्ह्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करण्यासाठी, कांकेर आणि दंतेवाडा हे दोन स्वतंत्र जिल्हे १९९९ मध्ये वेगळे करण्यात आले. यामध्ये कोंडागाव, दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर यांनी वेढलेले आहे. जगदलपूर जिल्ह्याचे मुख्यालय राजधानी रायपूरपासून ३०५ किलोमीटर अंतरावर आहे.



२०११ च्या जनगणनेत बस्तर जिल्ह्याची लोकसंख्या ८३४३७५ होती. त्यात ४१३७०६ पुरुष आणि ४२०६६९ महिला होत्या. बस्तरच्या लोकसंख्येमध्ये गोंड, मारिया, मुरिया, भात्रा, हलबा, ध्रुव असे ७० टक्के आदिवासी समुदाय आहेत. बस्तर जिल्ह्याची सात तहसील वर्गात म्हणजे जगदलपूर, बस्तर, बकवंद, लोहंडीउडा, टोकापल, दर्भा आणि बस्तर या भागात विभागणी करण्यात आली आहे. हे आदिवासी समुदाय, नैसर्गिक सौंदर्य आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे.
ओरिसात उगम पावणारी इंद्रावती नदी, जी सुमारे २४० किमीचा प्रवास करत दंतेवाडा आणि विजापूरमधून वाहते, ती भद्रकालीजवळ गोदावरीत विलीन होते. हि नदी बस्तरच्या लोकांची श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. जगदलपूर हे प्रमुख सांस्कृतिक आणि हस्तकला केंद्र आहे. बस्तरच्या आदिवासी लोकांच्या ऐतिहासिक आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तू धरमपुरा येथील मानववंशशास्त्रीय संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. बस्तर जिल्ह्यातील लोक कलाकार, उदारमतवादी आहेत.ते संस्कृती आणि निसर्गाने समृद्ध प्रदेशाचे रहिवासी आहेत.
बस्तर जिल्हा घनदाट जंगले, उंच टेकड्या, धबधबे, गुहा आणि जंगली श्वापदांनी भरलेला आहे. बस्तर महाल, बस्तर दसरा, दलपत सागर, चित्रकोट धबधबा, तीरथगड धबधबा, कुटुमासर आणि कैलास लेणी ही पर्यटनाची प्रमुख केंद्रे आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, हा प्रदेश रामायणातील दंडकारण्य आहे आणि महाभारतातील कोसल राज्याचा एक भाग आहे.
बस्तरचे संस्थान इ.स. १३२४ च्या सुमारास स्थापन झाले, जेव्हा शेवटचा काकतीय राजाचा भाऊ अनम देव, प्रताप रुद्र देव ( इ.स.१२९०-१३२५) याने वारंगल सोडले आणि बस्तरमध्ये आपले शाही साम्राज्य स्थापन केले. महाराजा अनम देव, महाराजा हमीर देव, बैताल देव, महाराजा पुरुषोत्तम देव, महाराज प्रताप देव, दिक्पाल देव, राजपाल देव यांच्यानंतर राज्य केले. बस्तर राजवटीची सुरुवातीची राजधानी बस्तर शहरात स्थायिक झाली आणि नंतर ती जगदलपूरला हस्तांतरित झाली. बस्तरमधील शेवटची राजवट महाराजा प्रवीर चंद्र भांज देव (१९३६-१९४८ ) यांनी केली होती. महाराजा प्रवीर चंद्र भांग हे बस्तरच्या सर्व समुदायांमध्ये, प्रामुख्याने आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय होते. दंतेवाडा येथील प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिराच्या नावावरून दंतेश्वरी, जी अजूनही बस्तर प्रदेशाची देवी आहे. १९४८ मध्ये भारताच्या राजकीय एकीकरणादरम्यान, बस्तर संस्थान भारतात विलीन झाले.
बस्तरचे पर्यटन :-
जेव्हा धबधब्याबद्दल विचार करतो तेव्हा सहाजिकच पहिले नाव येते ते जगप्रसिद्ध नायगरा धबधब्याचे ! परंतु खुद्द भारतातच इतकी अस्पर्शित पर्यटन स्थळे आहेत आणि ती शतकानुशतके अस्पर्शित राहिली आहेत, ज्याबद्दल भारतातील लोकांनाही माहिती नाही. छत्तीसगडच्या बस्तर भागातील जगदलपूरचा चित्रकोट धबधबा इतका आकर्षक आणि आकर्षक आहे की त्याला भारताचा नायगारा म्हणणाऱ्यांची कमी नाही. बस्तरला धबधब्यांची मालिका असली, तरी चित्रकोट हे त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे. पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार हा धबधबा देशातील सर्वात रुंद मानला जाते. सर्व ऋतूंमध्ये वाहणारा हा धबधबा दीड किलोमीटर रुंद आणि ९० फूट उंच आहे. वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत याचे पाणी लाल असते, तर उन्हाळ्याच्या चांदण्या रात्री ते दुधाळ पांढरे दिसते. या धबधब्यातून कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात प्रवाह वेगवेगळ्या प्रसंगी पडतात. बस्तरमधील इतर अनेक धबधबे देखील पाण्याच्या प्रचंड प्रमाणामुळे विहंगम अनुभूती देतात, त्यापैकी तिरथगडचा धबधबा देखील प्रसिद्ध आहे. बस्तरच्या या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. जो खडकांच्या मधून ३०० फूट खोलीपर्यंत वाहते, खरे तर छत्तीसगड हे जंगलाने व्यापलेले राज्य आहे. आदिवासी सभ्यता आणि संस्कृती अजूनही येथे अस्तित्वात आहे, जी जाणून घेण्यासाठी आणि जवळून पाहण्यासाठी परदेशी लोक भारतात येतात, परंतु छत्तीसगड राज्याची निर्मिती होईपर्यंत छत्तीसगडमधील अनेक प्रसिद्ध आणि पर्यटन महत्त्वाच्या ठिकाणांचा शोध लागला नाही. उदाहरणार्थ, चित्रकोट धबधबा हा देशातील सर्व धबधब्यांपैकी सर्वात रुंद आहे. जगदलपूरजवळ ३० किलोमीटर अंतरावर नैसर्गिकरीत्या तयार झालेली कोटमसर गुहाही आहे. जी जगप्रसिद्ध आहे. अश्मयुगीन संस्कृतीच्या खुणा आजही येथे पाहायला मिळतात. गुहेच्या आतील पाण्याचे तळे आणि चंदेरी स्टॅलेग्माइट-स्टॅलेक्टाईट फॉर्मेशन्स कोणत्याही पर्यटकाला थांबून पाहण्यास भाग पाडतात. बस्तर व्यतिरिक्त, अंबिकापूरपासून ८० किलोमीटर अंतरावर अंबिकापूर-रामानुजगंज रस्त्याजवळ तातापानी नावाचा धबधबा आहे. येथे गरम पाण्याचे ८-१० कुंड आहेत. रायगड जिल्ह्यातील घनदाट जंगलांमध्ये केंदई गावात सुमारे १०० फूट उंचीवरून एक डोंगराळ भागातून वाहणारी नदी कोसळून एक सुंदर धबधबा बनते. तो केंदाई फॉल्स म्हणून ओळखला जातो. छत्तीसगड आता साहसी इको-टूरिझमच्या क्षेत्रात झपाट्याने आपला ठसा उमटवत आहे. कोटमसर गुंफा, कैलास गुंफा, दंडक गुंफा, अरण्यक गुहा आणि हिरवाईने नटलेल्या दऱ्या निसर्गप्रेमींना भुरळ घालतात. बस्तर हे खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेला केशकल आणि चारमा दरी, दक्षिणेला दर्भाची झीरम दरी, पूर्वेला अराकू दरी, पश्चिमेला बंजारीन दरीसह पिंजारीन दरी, रावाघाट, बडे डोंगर (छत्तीसगडमधील डोंगर, बडे डोंगर म्हणून ओळखले जाणारे) प्रसिद्ध आहेत. या नैसर्गिक झऱ्यांसोबत अनेक दंतकथाही लोकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रामझर्ना या प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत असे प्रसिद्ध आहे की, श्रावण महिन्यात या तलावात स्नान केल्याने त्वचेशी संबंधित आजार बरे होतात. याचे शास्त्रीय कारण असे मानले जाते की या झऱ्याचे पाणी डोंगरावरील शेकडो वनौषधींच्या झुडपांतून वाहते आणि रोगांविरुद्ध भरपूर प्रतिकारशक्ती प्राप्त करते. परिसरात आयुर्वेदिक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. धमतरी (रायपूरपासून ७० किमी दूर) येथील गंगारेल जलाशय हे जलाशय पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी एक आकर्षक पर्यटन स्थळ बनले आहे. गांगरेल धरणात लाखो क्युसेक पाणीसाठा झाला आहे. अतिशय नियोजनपुर्वकरित्या ते विकसित करण्यात आले असून येथे पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
इथली भटकंती ठरवताना नाही म्हणलं तरी मनात थोडी भीती होतीच. अतिशय बदनाम असा हा प्रदेश.
कधी वाटायचं कि एखादे वहिवाटीचे, सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ निवडावे आणि करावी मस्त ट्रिप. आपण तिथे गेलो आणि काही झालं तर? त्यात तीन जेष्ठ महिला आणि एक लहान मूल बरोबर आहे. काही अघटित घडलं किंवा कोणती मेडिकल emergancy आली तर कसं? मग विचार केला कि “अघटित घडायचेच असेल तर ते कुठेही घडू शकेल मग आता का विचार बदला? जो होगा सो देखा जायेगा”.
"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको". अनंतफंदीं पहिल्याच फटक्यात सांगून गेले आहे. पण बिकट वाटच आवडली असेल तर? सतत जाऊन जाऊनच ती वहिवाटीची होईल ना...! आणि खरं सांगते या आडवाटा विलक्षण सुंदर ठरल्या. वाटेवर भेटलेल्या जागा सुंदर, इथली माणसे त्याहून सुंदर.
भटकंती करताना कुठेही धोका जाणवला नाही. सामान्य जनतेसाठी, पर्यटकांसाठी एकदम सुरक्षित जागा आहे ही. आपण काळजी मात्र घ्यायची. सरकारी वाहनाने शक्यतो प्रवास करू नये. आपण सरकारी नोकर असल्यास, मोठ्या हुद्द्यावर असल्यास ती ओळख सर्वांना सांगत बसू नये. आणि सरकारी धोरणाबद्दल कुठलीही चांगली वाईट चर्चा करू नये. संभाषणात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, भाजप, काँग्रेस असे विषय न येऊ देण्याची खबरदारी घ्यायची.
आधी ठरवल्याप्रमाणे बरीचशी ठिकाणे बघता आली. काही हुकली तर काही अनपेक्षितरित्या गवसली. खर्चाच्या दृष्टीने बघितलं तरी एकदम परवडणारी सहल झाली. रायपूर - जगदलपूर - रायपूर या एकंदरीत प्रवासखर्च (यात बसचं तिकीट, एका रात्रीचा हॉटेल स्टे, फिरण्याची गाडी, जेवण, छोटेमोठे पार्किंग फी वगैरे सगळं धरून) देखील दरडोई रुपये ७५५२ फक्त.
आमच्या भटकंतीचा नकाशा खाली देते आहे. कोणाला जायचं असल्यास कामी येईल.
रायपूरपासून जवळपासची / आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे कोणती, तेथे पोचण्याची साधने काय, प्रवासाचे अंतर किती आणि कसे कापायचे यावर गूगलबाबाच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. तसेच आणखी एक नियम यावेळी आम्ही आम्हालाच घालून घेतला कि शक्य तितक्या कमी खर्चात हि ट्रिप आखली गेली पाहिजे. तरीदेखील कोणत्या प्रवासी कंपन्या अश्या टूरचे आयोजन करतात का याचा पण आढावा घेतला. म्हणजे प्रवासी कंपन्या आपल्या पॅकेजमध्ये काय काय सुविधा देतात. कोणत्या ठिकाणांचा समावेश करतात हे एकदा कळले कि आपण त्यानुसार स्वतः व्यवस्थित आखणी करू शकतो.
जगदलपूर मध्ये २ दिवस २ रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले आणि मेक माय ट्रिप (MMT), अगोडा, GOIBIO या वेबसाइट्स वापरून मुक्कामासाठी योग्य ठिकाणे बघायला सुरवात केली.
मिळवलेल्या सगळ्या माहितीनुसार सिरपूर, जगदलपूर, कांकेर आणि तिरथगड या ठिकाणांना भेट देण्याचे निश्चित केले. रायपूरला पोचल्यावर थेट जगदलपूर, तिथून दुसऱ्या दिवशी कांकेर येथे कूटूमसर गुहा आणि तिरथगड धबधबा करून रात्री परत जगदलपूर आणि तिसऱ्या दिवशी जगदलपूर शहर आणि चित्रकोट धबधबा पाहून रायपूरसाठी प्रस्थान. चौथ्या दिवशी सिरपूर या रायपूर जवळील प्राचीन जैन मंदिर समूह आणि पुरातात्विक उत्खननाच्या स्थळाला एकदिवसीय भेट आणि सायंकाळी रायपूर शहर दर्शन व थोडीफार स्पेशल खरेदी/खादाडी करून पाचव्या दिवशी नागपूरला परत असा ढोबळ कार्यक्रम आखला गेला. आणि मित्रमंडळींसमोर ट्रिपचा डंका वाजवला ...
काही प्रतिक्रिया अपेक्षित तर काही अनपेक्षित.
"बस्तरला जातायत? त्यातही जगदलपूर? लाईफ इन्शुरन्स केलाय ना?" एक काळजी.
"अरे कशाला त्या नक्षलग्रस्त भागात जाताय? दुसरी ठिकाणे नाहीत का?" एक विचारणा
तर काहींचे म्हणणे कि "बिनधास्त जा, काही धोका नाही. अविस्मरणीय सहल होईल".
वेगवेगळी मते आणि मतांतरे.. पण 'अतिशय सुंदर प्रदेश आहे' यावर मात्र एकमताने शिक्कामोर्तब.
जगदलपूर मधील २-३ हॉटेल्स निवडून प्रत्यक्ष बुकिंग करण्याआधी त्यांना फोनवर संपर्क केला. कारण तेच... वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे 'जगदलपूरमध्ये फिरणे किती सुरक्षित?' असा किडा डोक्यात वळवळायला सुरवात जी झाली होती. त्यात बरोबर दोन जेष्ठ नागरिक स्त्रिया आणि एक लहान मुलगी. नाही म्हणलं तरी जरा काळजी वाटत होतीच. पण फोनवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शंकांचे निरसन झाले. शिवाय प्रत्येक हॉटेल ज्या वेगवेगळ्या सुविधा देतात त्याबद्दल पण माहिती मिळाली. सरतेशेवटी राहण्यासाठी 'हॉटेल नमन बस्तर' ची निवड केली. आणि दि. २७-१२-२०२२ रोजीचे ३ adults १ child साठी बुकिंग केले.
आता तिकीट बुकिंगचा दुसरा टप्पा... माझा आणि लेकीचा प्रवास सुरु होणार पुण्यातून. नागपूरला घरी ख्रिसमस एन्जॉय करून व दोन दिवस थांबून आईसोबत पुढच्या प्रवासासाठी नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसचे आरक्षण केले. २६ डिसेम्बरची सकाळी ६:१५ ची रेल्वे. रायपूरला पोचणार दुपारी ११:०० वाजता. पुढे रायपूर-जगदलपूर हया ३०० कमी अंतराच्या प्रवासासाठी बस, रेल्वे आणि विमान हे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. रायपूरहून रोज दुपारपासून दर १५ मिनिटांच्या अंतराने बसेस आहेत ज्या सर्वसाधारणपणे साडेसहा ते सात तासांत हे अंतर कापतात. तसेच दुर्ग-जगदलपूर एक्सप्रेस हि रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावते पण हि गाडी एवढे अंतर कापायला १४ तास घेते आणि पार ओडिशामधून फिरवून आणते. राहता राहिले विमान. तर दररोज एक alliance एअरलाईन्सची ५५ मिनिटांची फ्लाईट असल्याचे कळले पण त्यांचे नेटवर रिव्युज काही खास न्हवते व अनेकदा त्यांच्या फ्लाईट्स वेळेवर रद्ददेखील होतात असे हॉटेलवाल्यानी पण सांगितले. सर्वदृष्टीने वेळ आणि आर्थिक गणित यांचा विचार केल्यास बसप्रवासाचा पर्याय सर्वात सोयीचा वाटला.
३ सिनिअर सिटीझन, एक जुनियर सिटीझन आणि मी, अशी पाच जणांची यात्रा ठरली. त्याच सुमारास रेल्वे मंत्र्यांनी मध्य भारतासाठीच्या पहिल्या 'वंदेभारत एक्सप्रेसची' घोषणा केली.. अरे वा.. चला हा पण अनुभव घेऊन टाकूया ..! लगोलग परतीचे तिकीट (रायपूर- नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसचे बुक केले. बसचे जाण्यायेण्याचे तिकीट काढून झाले, व्हॉटसॅप ग्रुप तयार झाला, त्यावर सगळे अपडेट्स, सूचना, तिकिटांच्या प्रती, सगळ्यांचे आधार कार्ड्स, इमरजंसी फोन नंबर्स, घरचे संपर्क क्रमांक अशा असंख्य गोष्टींची देवाण घेवाण सुरु झाली. आणि सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.
'भारत का दिल' म्हणजे मध्यभारत हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश. ब्रिटिश अमदानीत CP & Berar प्रांत. घनदाट जंगले, पशू संपदा, खनिजे, वनस्पती विविधता असलेल्या या प्रदेशाच्या सीमा उत्तरेस सागर-जबलपूर पासून दक्षिणेस हैदराबाद संस्थानापर्यंत तर पश्चिमेस बुलढाण्यापासून पुर्वेस बस्तरपर्यंत होत्या. यात आजच्या भूगोलाच्या दृष्टीने बघितल्यास पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, बालाघाट, सातपुडा पर्वतरांगा, दंडकारण्य आणि छत्तीसगढ असे विभाग पडतात. हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून सुधा ओळखल्या जातो.
खरतरं मध्य भारताच्या एकंदरीतच समाज जीवन आणि संस्कृतीबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे. इथली घनदाट जंगले, भेडाघाट- चित्रकोट सारखे प्रचंड धबधबे, पचमढी- चिखलदरा ही पर्यटन स्थळे, चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील प्राचीन मंदिरे, इटियाडोह- नवेगावबांधसारखे जलाशय यांबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच.
तर सादर आहे मध्य भारतातल्या 'बस्तर' या नितांतसुंदर प्रदेशाची सफर. हा सध्याच्या छत्तीसगढ राज्याचा दक्षिण भाग. रामायणातील 'दक्षिण कोसल जनपद'. 'द ओरिजनल दंडकारण्य' .. नक्षलवादाचा डाग लागलेला हा प्रदेश. पण त्यामुळेच काहीसा अस्पर्श. नुसते भटकंतीचे वर्णन करण्यापेक्षा तेथे भेटलेली माणसे, बस्तरचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून द्यायची इच्छा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात काही ऐकीव दंतकथा पण येतील
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...
ख्रिसमस पार पडला. बॅग भरण्यावरून नेहमीप्रमाणेच असंख्य छोट्या मोठ्या चकमकी उडाल्यात (हि एक आमच्या घराची परंपरा आहे कारण आईसाहेबांना नेहमीच वजनाला हलक्या पण संख्येने जास्त बॅग्स घ्यायच्या असतात तर मला वजन जास्त झाले तर चालेल पण नग जास्त होता कामा नयेत. समोर आणून घातलेल्या ढिगातून गरजेपुरत्याच वस्तू निवडून बाकी पांघरायला घेतलेल्या चादरी,जास्तीचे पायमोजे/हातमोजे इ. वस्तूंवर काट मारली.
(इथला संवाद :
- "हि पांघरुणे कशाला घ्यायची ?"
- "अगं असू देत, आपल्या आपल्या चादरी असलेल्या बऱ्या"
- "अगं हॉटेल बुक केलं आहे तिथे. धर्मशाळा नाही"
- "बस मध्ये लागतील"
- "स्लीपर कोचचं बुकिंग आहे आपलं. ते देतात पांघरुणे"
- "छे छे. त्यांचं नको. कधी धुतात कि नाही कोण जाणे.. "
- "शाली घेतल्या आहे ना? त्या वापरा बस मध्ये". आणि मग बरीच धुसफूस होऊन पांघरुणे कपाटात परत गेलीत)
असो. तिघीत मिळून दोन बॅग्स आणि एक खाऊची पिशवी रात्रीच भरून ठेवली. सकाळी ५ वाजताच निघायचे होते. ओला शेड्युल करून ठेवली आणि रात्री जरा लवकरच गुडूप झालोत.
२६ तारीख उजाडली. ट्रेन स्टेटस ‘On Time’ बघून सव्वासहाची ट्रेन गाठायला पावणे सहालाच मध्य रेल्वेचे इतवारी स्टेशन गाठले आणि कानावर घोषणा.. 'प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे , गाडी क्रमांक 12856 , नागपूर- बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेच्या ५० मिनिटे उशिराने सुटेल. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबद्दल …
पहिली माशी इथेच शिंकली. ठीक आहे. आलिया भोगासी असावे सादर. १ तासच ना, बसुया स्टेशनवरच. तसे स्टेशन एकदम स्वच्छ होते त्यामुळे एक बेंच पकडून तिथे ठिय्या दिला. खाऊची पिशवी उघडल्या गेली. हळू हळू आमचे सहप्रवासी आजूबाजूला येऊन बसायला लागलेत. एक शाळेची सहल आली आणि शांत वातावरणात एकदम जिवंतपणा आल्यासारखा झाला. ७ वाजता मघाचीच घोषणा परत. पण आता ५० मिनिटांऐवजी २ तास ५० मिनिटे होती. आता वैताग यायला लागला. काही लोक इतर काही पर्याय मिळतात का ह्याची चौकशी करू लागलेत. आजूबाजूनी 'भारतीय रेल्वे'वर टीका / टिप्पणी सुरु झाली. विनोद सांगितले जाऊ लागलेत. काहींनी बसचा पर्याय निवडून रेल्वे स्टेशनवरून काढता पाय घेतला. पुन्हा एकदा तिसरी घोषणा झाली.... आपल्या निर्धारित वेळेच्या ५ तास १० मिनिटे उशिराने सुटेल..
आता मात्र आमचं धाबं दणाणलं. हे असंच चालू राहिलं तर कसं? जरी आपली जगदलपूरसाठीची बस रात्री उशिराची आहे तरी संध्याकाळच्या आत रायपूरला काहीही करून पोचायलाच हवं. बसल्या बसल्या मोबाईलवर इतर गाड्यांचे पर्याय शोधायला सुरवात केली. सगळीकडे १०० च्या पुढे WL किंवा मग सरळ REGREAT. आता कसं करायचं? yesss.. दुपारची २:३० ची वंदेभारत. AVL २०६. लगेच BOOK NOW वर क्लिक केले. इकॉनॉमी क्लासची ३ तिकिटे काढलीत. इंटरसिटीचं आरक्षण रद्द केलं. refund मिळाला तर ठीक, नाहीतर तेवढे पैसे 'भारत सरकार सेवार्थ' असं म्हणून १०:३० वाजता आमची वरात परत (खाऊच्या निम्म्या फस्त झालेल्या डब्यांसह) घरी दाखल झाली.
दुपारी १ वाजता जेवणे आटोपली. खाऊचा डब्बा नव्याने भरला. 'सुटसुटीतपणे वागवायला बरी' म्हणून एक एक्सट्रा बॅग तेवढ्या वेळात सामानात सामील झालीच. आणि यावेळेला ट्रेन स्टेटस तीन तीन वेळेला तपासून घेत परत एकदा आमच्या स्वाऱ्या स्टेशनात दाखल व्हायला रिक्षात बसल्यात. स्टेशन जवळ पोहोचलोच. एक उड्डाणपूल बाकी आहे कि आम्ही स्टेशनातच. पण.. पण.. पण..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे हे कसे काय बरे विसरलो आम्ही? झिरो माईल चौकाजवळ रास्ता रोको आंदोलन चालू होते. रस्त्यात अनेक मोर्चे, पोलिसांचे कठडे. मामूच मामू चहूकडे- गेली आता ट्रिप कुणीकडे??? एका पोलिसाने रिक्षा अडवली.
"मामा, स्टेशनपर जाना है. यहांसे नजदिक पडेगा, जाने दो ना" त्याने आत डोकावून बघताच आम्ही आर्जव केलं.
"कहाँ जाना हैं? कौनसे गांव? कौनसी गाडी से?"
उलटतपासणी सुरू झाली. सगळ्या चौकशीला यथाशक्ती सामोरे गेल्यावर(च) मामांचे समाधान झाले आणि त्याने बदली रस्ता सांगितला. १० मिनिटे इथेच गेलीत. आता घाई करणे गरजेचे झाले होते. रिक्षावाल्या भैयांना १० वेळा "जल्दी जल्दी चलो भैया, सौ रुपये एक्सट्रा देंगे" बोलून झाले. पण रिक्षा भयानक ट्राफिक जॅम मध्ये फसली होती. एकदा विचार केला. जाऊदे उतरू इथेच. समोर तर आहे स्टेशन. जाऊया चालत चालत. पण भैय्यानी त्यांचे रिक्षा चालनाचे कसब, नागपुरातल्या गल्लीबोळांचे ज्ञान आणि तोंडाने मुक्तपणे समोर येईल त्या प्राण्याला शिव्या घालण्याइतका (अप)शब्दसंग्रह यांच्या जोरावर आम्हाला गाडीसुटण्यापूर्वी बरोब्बर १० मिनिटे नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकाच्या मागील दारात म्हणजे 'संत्रा मार्केट गेट' वर नेऊन सोडले आणि एक्सट्रा १०० रुपये कमावलेत.
समोर आलेल्या पहिल्या कुलीला पकडले. “वंदे भारत. बोगी XYZ सीट नंबर XYZ” इतकेच सांगितले आणि सामान अक्षरश: त्याच्या हातात कोंबले. कुली "आओ मेरे पीछे" म्हणाला आणि (जवळ जवळ) अंतर्धान पावला. आम्ही अक्षरश: धूSSSSम पळत त्याच्या मागे निघालो. त्यात माँसाहेबांना स्वयंचलित जिन्यांचा फोबिया. आता आली पंचाईत. शेवटी मी समोरून आईचा हात धरून तिला हळूच ओढले आणि विजयालक्ष्मीने "आज्जी यू कॅन डू इट" म्हणत मागून हलकासा धक्का देत आजीला सरकत्या जिन्यावरून इच्छित डब्यासमोर आणण्याचे कठीण कार्य संपन्न केले. कुली आमच्या सीटवर वाट बघत बसला होताच. त्याचे भाडे घेऊन तो उतरताच गाडीचे दरवाजे बंद झालेत. हुश्श…
'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने' या म्हणीची पुरेपूर प्रचिती या अर्ध्या दिवसात आम्ही घेतली. आणि 'सफर'नामा या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांप्रमाणे उमजला.
'वंदे भारत एक्सप्रेस' के क्या केहने... ! सगळीकडे नव्याची नवलाई झळकत होती. स्वयंचलित दरवाजे, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि छत्तीसगढी अशा चौभाषिक घोषणा, स्पीड डिस्प्ले बोर्डस, सीटच्या पाठीला असलेले खानपानाचे टेबल्स, टिपटॉप गणवेशधारी कर्मचारी.
गाडीने वेग घेतला.. थोड्याच वेळात व्यवस्थित ट्रे मधून अल्पोपहार सर्व्ह करण्यात आले. त्यानंतर आईस्क्रीम. मज्जाच मज्जा..! विजीची पलीकडल्या सीटवरल्या अंकलशी गट्टी जमली होती. मग काय, त्यांच्या वाटणीचे आईस्क्रीम पण तिलाच.

गोंदिया पार केले आणि गाडीने महाराष्ट्र सोडला. आता नवे राज्य. आजूबाजूचा भूप्रदेश पण थोडाफार बदलायला लागला होता. विरळ तुरळक झाडी जाऊन आता गच्च घनदाट झाडी दिसायला लागली. आता गाडी 'डोंगरगढ - धारा रिझर्व फॉरेस्ट' मधून जाते.
साडेचार वाजता डोंगरगढ पार केले. 'बम्लेश्वरी' या मूळ आदिवासी देवतेचे ठाणे असलेले 'डोंगरगढ' हे या भागातले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. घनदाट झाडीने वेढलेल्या काळ्या खड्या कातळांवर वसलेल्या उंचावरच्या मंदिराचे गाडीमधूनच दर्शन होत होते.
या देवीला झेंडूच्या फुलांची आरास करतात. सोबतच्या अंकलनी त्याबद्द्लचे एक मजेशीर लोकगीत 'चलो चले देखणं को फुल गेंदा' अगदी तालासुरात म्हणून दाखवले.
असा हसत खेळत प्रवास पार पडला आणि सायंकाळी ६ वाजता रायपूर आले. आमच्या जुन्या वेळापत्रकानुसार तब्बल ७ तास उशिराने रायपूरात पाय ठेवला. तेथे कळले कि सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस अजूनही पोहोचली नाहीय..
जुन्या रायपुरातील डांगानिया भागात मावशीचे घर आहे. तिने भलेमोठे स्वागत केले. रात्रीसाठी स्वयंपाक करून ठेवलाच होता. इन मिन तीन जणी जेवायला (कच्चा-लिंबू गाडीतच खाऊन-पिऊन आता सुस्तावला होता) पण जेवण एकदम साग्रसंगीत. सुपापासून तुपापर्यंत चारीठाव जेवायला होते. "अगं एवढं कशाला करत बसलीस? आता लगेच रात्रीचा बस प्रवास आहे" तर मावशी सांगू लागली, कि "माझ्याकडे पाहुणे येणार म्हटल्यावर शेजाऱ्यांनी एक- दोन पदार्थ खास बनवून आणून दिलेत. आपके मेहमान वो हमारे मेहमान" अशी पद्धत आहे. म्हणून इतके पदार्थ झालेत". थोडे थोडके अन्न पोटात आणि बरेचसे फ्रीझ मध्ये ढकलले. थोडा वेळ आराम केला .
रात्री १०:३० वाजताची 'स्लीपरकोच' बस होती. नवे बसस्थानक जरा शहराच्या बाहेर असल्याने पावणे दहा वाजताच ज्योतीमावशी तिच्या मुलासह कार घेऊन हजर झाली व आम्ही ते भले मोठे बसस्थानक गाठले.
आजच्या दिवशीचा suffer नामा अजून संपला न्हवता हेच खरे. बस स्थानकात गेल्यावर कळले कि रायपूर पासून १० किमी अंतरावर कुठेतरी दोन ट्रक ड्रायव्हर्स मध्ये भांडण होऊन मारामाऱ्या झाल्यात आणि त्यांनी आता चक्का जाम सुरु केलाय. सगळ्या बसेस तेथे अडकल्या आहेत. 'जय हरी विठ्ठल. बसा आता इथेच भजन करत'. विजयालक्ष्मीला दिवसभराच्या दमणूकीने झोप अनावर झाली होती. मग तेथेच कारमध्ये तिला झोपवले.
अर्ध्या तासानंतर एक बस दुरून येताना दिसली. मग थोड्या थोड्या अंतराने एक एक बस येऊ लागली. "चला, विठ्ठल पावला म्हणायचं." आणि मग १०:३० च्या बस मध्ये पावणे बाराला झोपलेल्या बाळासह स्थानापन्न होऊन आम्ही जगदलापूरच्या दिशेने कूच केले.

बस एकदम नवी, स्वच्छ आणि अतिशय आरामदायक होती.
जगदलपूर हे शहर रायपूरच्या दक्षिणेकडे असून रस्त्याने हे अंतर २९० किलोमीटर आहे. वाटेत लागणारी मोठी गावे म्हणजे कुरुंद, धमतरी, चारामा, कांकेर, केशकाल आणि कोंडागांव. कांकेर पार केल्यावर रात्री अडीच वाजता गाडी एक धाब्यावर थांबली. कोणाला चहा हवा असेल किंवा वॉशरूम वापरायची असेल तर इथेच जावे लागेल. इथून पुढे आपण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. यानंतर गाडी आता थेट जगदलपूर शहरातच थांबेल अशी चालकाने सूचना दिली आणि २० मिनिटांची विश्रांती जाहीर केली.
इथून पुढे आपण दंडकारण्यात प्रवेश करतो. या घाटाचं नाव आहे 'केशकाल घाटी' ज्याला दंडकारण्याचे प्रवेशद्वार म्हणतात. शतकानुशतके या पहाडांमुळे बस्तर प्रदेश अस्पर्श राहिला होता. इथल्या दुर्गम भूभागाने बस्तरच्या नाग चालुक्य राज्यावरील अनेक हल्ले परतून लावले.
'केशकाल’ या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे. इथली रस्त्याची अरुंद आणि अतिशय तीव्र उताराची अशी बारा वळणे आणि खोल दऱ्या नेहमीच वाहनांसाठी काळ ठरले आहेत. काळाच्या उदरात सामावण्यासाठी फक्त केसभर अंतराचा फरक महत्वाचा आहे म्हणून हा 'केशकाल' घाट. याचेच नाव 'बारा भंवर घाट' उर्फ 'तेलिन घाटी'.
घाटात 'तेलीण' मातेचे मंदिर आहे. तेथे सलामी देऊनच पुढील प्रवासाची सुरवात झाली. रस्ता दिसत जरी नसला तरी घाटाचे प्रत्येक वळण जाणवत होते. रात्रीच्या अंधारामुळे बाहेरची हिरवाई जरी दिसत नसली तरी या घुप्प अंधारात या गच्च जंगलाचा एक वेगळाच गंध आसमंतात जाणवत होता.
सकाळी ६ वाजता बस व्यवस्थित जगदलपूर बस स्टँडला पोचली. येथून हॉटेलवर जायला इ - रिक्षा आणि मोठ्या सहा आसनी रिक्षांची सोय आहे. मात्र ओला /उबेर कॅब सर्व्हिस जगदलापुरात दिसली नाही. इतक्या सकाळी पण बस स्टॅण्डवर बरेच रिक्षेवाले दिसत होते. त्यातलाच एकाला पकडलं.
"भैया नमन बस्तर जाना है"
हां मैडमजी, छोड देंगे, बैठिये आप आटो में" असं सांगितल्यावर रिक्षात सामान चढवून आम्ही सगळ्याजणी स्थानापन्न झालो पण महाराज काही निघायचं नाव घेईना.
आम्हाला वाटले आणखी सवारींसाठी थांबला आहे कि काय? "क्या हुआ भैय्या, चलते क्यू नहीं? "जी सब लोग आ गये क्या?" त्याचा प्रश्न. "हां भैय्या, सब बैठ गये हैं आप चलिये" असं म्हणताच तो हैराण होऊन आमच्याकडे बघत, 'खाली लेडीज्य' असं पुटपुटत चालकाच्या जागी स्थानापन्न झाला. हा असा अनुभव पुढे दोन - तीन वेळेला आला. फक्त बायका बायकाच हिंडताहेत असं पाहून अनेक लोक आश्चर्यचकित व्हायचे. काही ठिकाणी 'चार अकेली लेडीज' म्हणून छोट्या मोठ्या सवलती देखील मिळाल्या.
आता हळू हळू उजाडू लागले होते. आजूबाजूचा परिसर उजळायला लागला होता. सर्वप्रथम काही जाणवले तर कमालीची हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच उंच झाडे आणि अतिशय शुद्ध हवा.
१५ मिनिटांत 'हॉटेल नमन बस्तर' आले. रिसेप्शनच्या दाराशी आम्हाला सोडून रिक्षावाला परत गेला.

चहूकडे एकदम सामसूम. रिसेप्शनमध्ये पण कोणीच नाही. दारावरची घंटा दोनदा - तीनदा वाजवल्यावर एका अर्धवट झोपेत असलेल्या माणसाने दार उघडले. त्याला बुकिंग डिटेल्स दिलेत. डायमंड डबल रूमचे बुकिंग असून देखील आमच्यासाठी 'प्लॅटिनम स्वीट' राखून ठेवण्यात आला असल्याचे शुभवर्तमान समजले. झालं असं होतं कि आदल्या दिवशी जे त्या खोलीत राहत होते त्यांनी मुक्काम वाढवल्याने मधल्यामध्ये आम्हाला हि बढती मिळाली होती (आणि ती पण चकटफू). आनंदाने किल्ल्या ताब्यात घेतल्या.
हे हॉटेल म्हणजे साडेतीन एकर शेतजमिनीवर वसविलेले मस्त रिसॉर्ट आहे. मुख्य प्रवेशदारापासूनच दोन्ही बाजूला उंच उंच झाडे असलेला हिरवागार रस्ता पुढे स्वागतकक्षापर्यंत जातो.
स्वागतकक्षासमोरच एका भल्या मोठ्या झाडाखाली एक सिमेंटची छोटीशी टुमदार छत्री बांधली आहे आणि तिथे आपला गणपतीबाप्पा मांडला आहे.
रोज सकाळी या गणूबाप्पाची छोटीशी पूजा होते. तसेच इथला प्रत्येक कर्मचारी ड्युटीवर हजर झाल्यावर आधी या बाप्पाला भेट दिल्या शिवाय राहत नाही.
बाप्पा समोरून एक लांबच लांब पायवाट आत एका टेराकोटाच्या शिल्पाकडे जाते. हे एक बस्तरचे प्रतीकात्मक चिन्ह आहे.
या इस्टेटीमधून एक नैसर्गिक ओढा पण वाहतो. त्यावरला पिटुकला कमानदार पूल परिसराच्या सौन्दर्यात भर घालतो.
पुढे राहण्याचे कॉटेजेस आहेत. प्रत्येक इमारतीसमोर अतिशय सुंदर बाग राखलेली आहे.
एकीकडे भोजनगृह तर मधोमध सुंदर निगा राखलेले विस्तीर्ण लॉन, त्यावर उंच झाडाला टांगलेला झोका व लहान मुलांसाठी छोटेसे पार्क आहे.
आमचा छोटीशी बाल्कनी असलेला स्वीट पण भारी होता.
सकाळी ८ वाजताच फ्रेश होऊन हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन थोडाफार नाश्ता केला व दिवसभराच्या भटकंतीच्या नियोजनसाठी आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल मॅनेजरची भेट घेतली. इथे सरकारी वाहनाने शक्यतो कोणी प्रवास करत नसल्याने सरकारी वाहतूक व्यवस्था विशेष अशी नाहीय. शिवाय प्रत्येक ठिकाणी जायला वाहनांची वारंवारता देखील कमी आहे. त्यामुळे हॉटेलची गाडी वापरण्याशिवाय पर्याय न्हवता. बरं हॉटेलच्या गाडीचे आधीपासून बुकिंग करून ठेवायला त्याने साफ मनाई केलेली होती.
इथे मात्र मनमर्जीचे दर सांगण्यात आले. आम्हाला सांगितले गेले कि
“आता एकाच इनोवा गाडी दिवसभरासाठी उपलब्ध आहे. १० वाजता हॉटेल मधनं निघून कांगेर अभयारण्य आणि तिरथगड धबधबा दाखवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत घेऊन येऊ. तसें तर माणशी ३००० रुपये घेतो पण तुम्ही एकूण दिवसभरासाठी ११००० रुपये भरा.”
मी घासाघीस करायला लागले पण मॅनेजर मात्र अडून बसला होता. आता मात्र थोडा लबाडीचा वास यायला लागला.
"आधे घंटे में फायनल बताईये मॅडम".
समोरून अल्टिमेटम आला.
म्हटलं ठीक आहे सांगते आणि बाहेर आले. आता पुढे काय करावं ह्याबद्दल आपापसात चर्चा चालू असतानाच हॉटेलचाच एक कर्मचारी हळूच म्हणाला
"मेरे दोस्त कि गाडी है अव्हेलेबल, खुद्द ड्रायविंग करता हैं, आपको घुमा लायेगा पुरा दिन. आप कहते हो तो बात करूं क्या?"
म्हटलं दे बाबा नंबर. त्याच्या मित्राबरोबर बोलले. दिवसभराचे ४५०० रुपये ठरले. २० मिनिटांत पिकअपला येतो म्हणाला. आम्ही तयार होतोच. पाणी आणि भरपूर खाऊ सोबत घेतला. ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
बस्तर : कांगेर राष्ट्रीय उद्यान
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पहिला थांबा कांगेर अभयारण्य. जगदलपूर पासून दक्षिणेकडे ३५ किमी अंतरावर कांगेर अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण रस्ताच घनदाट वनामधून जातो. किरणकुमार बरेच बोलके निघालेत. बस्तरच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे मनापासून प्रेम आणि सार्थ अभिमान वागण्या बोलण्यात दिसून येत होता. 'रामजी' चे निस्सीम भक्त. "सीतामैय्या हमारी मैया, और लछमन हमारे बडे भैय्या. पार लगा दे सबकी नैय्या".अशी ठाम श्रद्धा. स्थानिक संस्कृतीबद्दल बरीच माहिती होती त्यांना. अर्ध्या तासात कांगेर घाटी नॅशनल पार्क च्या प्रवेशद्वारासमोर गाडी उभी केली.
इथे पूर्वी खाजगी गाडयांना आत जाऊ देत मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या जिप्सी सफारींनाच प्रवेश आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे सफारीसाठी शुल्क भरले. जिप्सीचा नंबर यायला वेळ लागला तोवर किरणजी माहिती सांगू लागलेत.
सुमारे २०० वर्ग किमी क्षेत्रात पसरलेल्या कांगेर खोऱ्याचे नाव कांगेर नदीवरून पडले आहे जी छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवरून वाहते. या अरण्यात अनेक उंच पहाड, खोल दऱ्या, महाकाय वृक्ष आणि विविध वन्यफुले आणि वन्यजीव आढळतात. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील येथे उगवतात. बस्तर मैना हा छत्तीसगढचा राज्यपक्षी जो हुबेहूब माणसासारखा आवाज काढू शकतो तो पण येथेच आढळतो.
संपूर्ण बस्तर मध्ये अनेक छोटे मोठे धबधबे आहेत त्यांपैकी १० प्रमुख धबधबे कांगेर अभयारण्यात आहेत.
२ तासांच्या प्रतीक्षेनंतर जिप्सी आली. जंगल सफारी सुरु झाली. अगदी घनदाट असे जंगल. ज्याला ‘अरण्य’ हाच योग्य शब्द आहे. काही ठिकाणी झाडे आणि वेलींची तर इतकी दाटी आहे कि खरंच सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही.
आत जाण्याची वाट गर्द जंगलातून होती. वर निरभ्र निळेभोर आकाश, वाटेत कुठे एखाद्या झाडाखाली जंगली बोरांचा सडा पडलेला तर कुठे उंच उंच तपकिरी मातीची वारुळे उभी होती. मुंग्यांच्या वारुळांना ‘बांबी असे नाव आहे तर उधईच्या (वाळवी) वारुळांना इकडे 'वल्मिक' म्हणतात. या वल्मिकची एक गम्मत सांगितली गाईडने. कि हि उधईची वारुळे म्हणजे जंगलातले होकायंत्र. याची पूर्वेकडील बाजू नेहमीच सपाट गुळगुळीत असते तर पश्चिम टोकदार. या वारुळांमध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला 'फुटू भाजी' उगवते. मश्रुमचा एक प्रकार असलेली हि भाजी स्थानिक आदिवासी गोळा करून आणतात व ती रायपूर आणि भुवनेश्वरच्या बाजारात १५०० ते २००० रुपये किलो भावाने विकली जाते.

आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनेक छटा, नुसत्या बघण्यापेक्षा अनुभवण्यासारखा. जंगलातली निरव शांतता व मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा चिवचिवाट, वातावरणात भरून राहिलेला एक विशिष्ट गंध कितीतरी वेळा दीर्घ श्वास घेऊन छातीत भरून घेतला. ऐन डिसेंबरमधले कोवळे उबदार ऊन आणि जिप्सीच्या वेगामुळे सपासप कापली जाणारी थंडगार हवा. ती दहा पंधरा मिनिटे सगळे शांत बसून अनुभवत होते. जरा वेळाने दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.
आम्ही आता कांगेर नदी जवळ पोचलो होतो. हि नदी बारमाही वाहणारी आहे. जंगलात बऱ्याच आतमध्ये एका मोकळ्या जागी जिप्सी थांबवली. पुढे काही नैसर्गिक पायऱ्या उतरून थोडे समोर जावे लागते. नदीच्या प्रवाहात 'धारा' नावाचा एक सुंदर छोटासा तीन पायऱ्यांचा धबधबा आहे. त्याला 'कांगेर-धारा' पण म्हणतात.
हिरव्यागार परिसरात काळे खडक आणि मधून वाहणारी दुधासारखी शुभ्र धारा आणि ह्या शांततेत ऐकू येणारा फक्त आणि फक्त पाण्याचा खळखळाट. इथले पाणी उथळ आणि सुरक्षित आहे.
नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण काळे खडक खाली उतरत जातात. तिथे कातळांवर बकरीची छोटी छोटी पिल्ले उड्या मारत बागडत होती. या वातावरणात ते दृश्य फार लोभसवाणे वाटत होते. तेथून पाय काही निघेना.
थोडे दूर भैसा दरहा नावाचे तळे आहे. दरहा/ दरा म्हणजे नदीने वळण घेताना तयार केलेला पाण्याचा तलाव. येथे मगरींचे नैसर्गिक निवासस्थान आहे तसेच कांगेर नदीला मिळणाऱ्या उपनद्या व हंगामी नाल्यांमुळे या खोऱ्यात काही भागात 'झोडी' (दलदलीसदृश्य जमीन) निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पर्यटकांना प्रवेश नाही.
कुटुमसर गुहा (Kutumsar, Limestone Caves in Chhattisgad)
हे राष्ट्रीय उद्यान तीन विलक्षण लेण्यांचे घर आहे. कुटुंबसर, कैलास आणि दंडक. स्टॅलेग्माइट्स आणि स्टॅलेक्टाइट्सच्या रचनांसाठी आणि भूमिगत चुनखडीच्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
यांपैकी कोटमसर गुहा बघायला निघालो. ही गुहा मूळात गोपनसर गुहा (गोपन = लपलेली) म्हणून ओळखली जात होती परंतु 'कोटसर' गावाजवळ असलेल्या या गुहेला कोटमसर (कुटुमसर) असे नाव पडले.
इथल्या जंगलातल्या आदिवासीपाड्यातील स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने गुहा दाखवण्यासाठी गाईड म्हणून त्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. आमची पावती पाहून गाडीची नोंद करून गाईड बरोबर दिला जातो. नक्षलवादाकडे गावातले तरूण वळू नयेत म्हणून सरकारतर्फे त्यांना गाईडचे ट्रेनिंग देण्यात आले. प्रत्येक गाडीमागे त्यांना १००/- रुपये रोजगार मिळतो. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे सुट्ट्या चालू असूनही दिवसाला फारतर १० गाड्या येतात. त्यामुळे प्रयेकाला रोज रोजगार मिळतोच असे नाही , त्यामुळे त्या दिवसाचा मिळणारा रोजगार सर्व जण मिळून वाटून घेतात. सरकार आणि नक्षलवाद्यांच्या भाडंणात शांतपणे जीवन जगू पाहाणार्या या तरूणांची नाहक फरफट होतेय.
कुटुमसर गुहेच्या तोंडाकडे जाणारा निमुळता रस्ता
कुटुमसर गुहेच तोंड
गुहेत उतरण्याचा मार्ग
गुहेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गाडी थांबली. आसपास दाट जंगल होत. पण गुहेचा कुठे मागामुस नव्हता. फरसबंदी पायवाटेवरून आम्ही दोन उंचवट्यांमध्ये असलेल्या दरडीत पोहोचलो. त्यातील डाव्या बाजूच्या उंचवट्या खाली गुहेच प्रवेशव्दार होते. एकावेळी एकच माणूस बसून प्रवेश करू शकेल अशा दारातून आम्ही गुहेत प्रवेश केला. आत उतरण्यासाठी पायर्या बनवलेल्या त्यावरूनही बसूनच उतरता येईल अशी चिंचोळी जागा होती. शेवटची पायरी उतरल्यावर चक्क उभे राहाण्या एवढी जागा होती. समोरच लवणस्तंभांमुळे तयार झालेलं प्रवेशव्दार आमच स्वागत करत होत.या गुहेची लांबी ३३० मीटर असून सुमारे ५५ मीटर खोलवर पसरली आहे आहे. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय अरुंद असून १२ फूट खाली गेल्यावर एकावेळी दीडशे माणसे राहू शकतील एवढ्या विस्तीर्ण कक्षात आपण प्रवेश करतो. असे ५ मोठे कक्ष आतापर्यंत सापडले आहेत. एक लांबच लांब मार्गिका पूढे अंतर्भागात घेऊन जाते. गुहेत १० वर्षांखालील मुले तसेच ६० पेक्षा जास्त वय असलेल्या किंवा श्वसनविकार असलेल्या पर्यटकांना प्रवेश नाही.आतील हवा ओलसर दमट होती व वातावरणात एक वेगळाच शेवाळलेला कुंद वास दरवळत होता. गुहेत जागोजागी मार्गदर्शक खुणा केल्या आहेत व ठराविक वाट सोडून इतस्त: फिरण्यास सक्त बंदी आहे.


लवणस्तंभांनी तयार झालेल प्रवेशव्दार
करोडो वर्षापूर्वी झालेल्या उलथापालथीत समुद्र तळाची जमिन वर आली. अशा प्रकारे तयार झालेल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे थर असतात. त्यातील चूनखडीचा (calcium carbonate) थर पावसाच्या जमिनीत मुरणार्या पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहात जातो. हजारो वर्षे ही प्रकीया चालू असते. त्यातूनच जमिनीखाली गुहा तयार होतात. या गुहांची निर्मिती आजही चालू आहे, पण त्याचा वेग फरच कमी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. या गुहांची तोंड आडवी (Horizontal) किंवा उभी( Vertical ) असतात. या गुहा तयार होतांना / झाल्यावरही गुहेच्या छ्तावरून झिरपणारे पाणी आपल्या बरोबर विरघळलेले क्षार घेऊन येत. हे क्षार छ्तालाच चिकटून राहातात आणि पाण्याचा थेंब खाली पडतो. त्यात असलेला क्षाराचा अंश जमिनीवर जमा होतो. अशाप्रकारे क्षाराचे थर छ्तापासून जमिनीकडे जमा होतात त्याला stalactites म्हणतात व जमिनीकडून वरच्या दिशेला जमा होणार्या क्षारांना stalagmite म्हणतात. कालांतराने ही दोन्ही टोक जोडली जाऊन लवण स्तंभ (Column) तयार होतो. अनेक वर्ष चालणारी प्रक्रीया असल्यामुळे गुहेत वेगवेगळ्या अवस्थेतील लवणस्तंभ पाहायला मिळतात. गुहेच्या आतमधून पाण्याचा प्रवाह वाहतो व या गुहेच्या आतील पाण्यात शंकरी नावाचे रंगीबेरंगी आंधळे मासे आढळतात.भारतात मेघालय, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यात चुनखडीच्या गुहा (Lime stone caves) आहेत. Krem Liat Prah ही मेघालयातील गुहा भारतातील सर्वात लांब गुहा असून तीची लांबी ३१ किमी आहे. इ.स. १९५८ ला डॉ. तिवारींनी शोधलेल्या कुटुमसर गुहेची लांबी ५०० मीटर आहे.

एका बाजूला वाहात पाणी
काही ठिकाणी गुहेची उंची ३ मजल्या एवढी आहे
कुटुमसर गुहेतील लवण स्तंभाच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर गुहेची उंची एकदम २० ते २५ फूट (३ मजल्या एवढी) वाढली. पाणाच्या प्रवाहामुळे गुहेच्या भिंतीवर अनेक प्रकारची नक्षी, आकार तयार झाले होते. आमचा वाटाड्या त्यात आम्हाला विविध प्राणी, पक्षी, डायनासोर यांचे आकार दाखवत होता. काही ठिकाणी दोन्ही बाजूच्या भिंतींवर वेगवेगळ्या रंगांचे लाटांसारखे पट्टे तयार झाले होते. गुहेला अनेक फाटे फुटलेले होते. आत जाऊन कोणी हरवू नये यासाठीच गाईड्ची व्यवस्था केली होती. गुहेत फिरतांना बर्याच ठिकाणी पायाखालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. निसर्गाचे गुहा खोदायच काम अविरतपणे चालू होतं. गुहेतील या पाण्यात दुर्मिळ आंधळा मासा (Albinic blind fish) पाहायला मिळतो. आपण शाळेत शिकलेला डार्विनचा उत्क्रांतीचा नियमाच हे जितजागत उदहरण आहे. कधीकाळी बाहेरून गुहेत आलेल्या या माशाला गुहेतील मिट्ट अंधारात राहात असल्यामुळे डोळ्यांची गरज उरली नाही, त्यामुळे त्याचे डोळे विकसित न होता त्याऎवजी त्याला लांब मिशा आल्या. या संवेदनशील मिशांच्या सहाय्याने तो आपले भक्ष्य पकडू शकला आणि विपरीत नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहीला. गुहेत आढळणारा दुसरा सजीव म्हणजे कोळी (crab spider or banana spider) त्याच्याही मिशा याच कारणासाठी त्याच्या आकाराच्या चौपट वाढलेल्या दिसत होत्या.

कोळी (crab spider or banana spider)
दुर्मिळ आंधळा मासा (Albinic blind fish) Add caption
गुहा पाहाण्यात किती वेळ गेला हे कळलच नाही. लवण स्तंभाच्या प्रवेशव्दाराशी आल्यावर सर्वांना बाहेर पाठवून दिले. गुहेच्या भिंतीला पाठ टेकवून बसलो. हातातील टॉर्च विझवला. मिट्ट आदिम काळोख सर्वत्र पसरला होता, डोळे उघडे आहेत की बंद हेच समजत नव्हते. गुहेतून वाहाणार्या आणि छ्तातून ठिबकणार्या पाण्याचा दुरवर अस्पष्ट आवाज येत होता. चित्तवृत्ती शांत होत होत्या. त्या गुहेचाच एक भाग झाल्यासारख वाटत होता. इतक्यात माने जवळ काही तरी हुळहुळल, माझी समाधी भंग झाली. हातातील टॉर्चचा प्रकाश भिंतीवर टाकला तर एक कोळी आपल्या लांब मिशांनी माझा अंदाज घेत होता. त्याला त्रास न देता शांतपणे त्याच्या राज्याच्या बाहेर पडलो.
गुहेतील रस्त्याला फ़ुटलेले फ़ाटे.
कोणी हरवू नये म्हणुन गुहेतील काही रस्ते बंद केलेत.
पुढे खोल अंतर्भागात एक प्राचीन शिवलिंग असून स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेनुसार श्रीराम वनवासात असताना या भागात वास्तव्य करून होते व गुहेतल्या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष रामाने केली आहे.
असं म्हणतात कि या गुहेतून जाणारे गुप्त भुयार थेट जगन्नाथपुरीजवळ उघडते. अलीकडेच २०११ साली या गुहेत आणखी एक कक्ष सापडला आहे. पावसाळ्यात मात्र गुहेच्या आतील प्रवाह रौद्ररूप धारण करतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर सुरक्षेच्या कारणासाठी गुहा बंद ठेवतात.
झिरपणार्या पाण्यामुळे छतावर तयार झालेली नक्षी
झिरपणार्या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी
जाण्यासाठी :- कुटुमसर गुहा पाहाण्यासाठी छत्तीसगड राज्यातील जगदाळपूर हे जवळचे शहर आहे.
(१) मुंबई - नागपूर - रायपूर - जगदाळपूर या मार्गे जगदाळपूरला जाता येते.
(२) मुंबईहून ट्रेन / विमानाने विशाखापट्टणम गाठावे. विशाखापट्टणमहून सकाळी जगदाळपूर साठी पॅसेंजर सुटते किंवा खाजगी वाहानाने बोरा केव्हज, त्याडा, कॉफी प्लांटेशन/ म्युझियम, अरकू व्हॅली पाहात जगदाळपूरला जाता येते.
पाहाण्यासाठी:- जगदाळपूर जवळ कांगेर घाटी अभयारण्य, सहस्त्रधारा धबधबा, चित्रकुट धबधबा आणि जगदाळपूर मधील पॅलेस ही ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.
कांगेर राष्ट्रीय उद्यान :-
सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.

राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून वायव्येकडे पुढे १५ किमी अंतरावर ‘तीरथगढ’ धबधबा आहे. वीस मिनिटांचा रस्ता. रस्त्यातच एका ठिकाणी ‘व्हू पॉईंट’ आला. तिथून लांबूनच या जलप्रपाताचे दर्शन होते. पुढे गेल्यावर एक छोटासा फलक दिसला – ‘तीरथगड जलपात कि ओर’. हा धबधब्याकडे जाण्याचा ट्रेकिंगचा मार्ग. एक छोटी वाट जंगलात गेली आहे. पण गाडीमार्ग थोडा लांबचा फेरा घेऊन जातो. दुपारचे दीड वाजून गेले होते. पार्किंगला गाडी लावली. परिसरात छोटी छोटी दुकाने, ढाबासदृश खानावळी, माळबांगड्यांची दुकाने, प्लास्टिकची खेळणी विकणारे विक्रेते, काय विचारू नका. गावाकडच्या जत्रेत आल्यासारखे वाटले. इथे खाण्या पिण्याची रेलचेल आहे. मात्र आधुनिक तऱ्हेचे पदार्थ मिळत नाहीत. कडकडून भूक लागली होती. किरणजींना म्हटले "आधी पेटपूजा करू, बाकी सगळं नंतर". किरणभैय्या एका ढाब्याकडे घेऊन गेले. गल्ल्यावरच्या माणसाबरोबर नमस्कार चमत्कार झाले. ४ व्हेज थाळींची ऑर्डर दिली. म्हटलं " किरणजी, तुम्ही पण बसा आमच्या बरोबरच". तर म्हणाले "आप शुरु किजीये, हम बादमे आते हैं". ठीक आहे. कदाचित त्यांना संकोच वाटत असावा. निवांत बसून आजूबाजूचे निरीक्षण सुरु केले.

झाडाची मोठाली पाने, टिनाचे पत्रे आणि बांबूचे खांब वापरून मांडव घातला होता. त्यालाच ढाबा म्हणायचं. धाब्याच्या दारातच एका बाजूला भली मोठी चूल पेटवली होती. त्यावर भाताचे मोठे पातेले चढवलेले दिसत होते. दुसऱ्या चुलीवर फ्लॉवर - बटाटा भाजी रटरटत होती.
मागील बाजूला भाज्यांचे वाफे केले होते. मिरच्या, पालक, टोमॅटो, कोथिंबीर लावलेली दिसत होती. एक मोठा प्लास्टिकचा ड्रम भरून पाणी आणि लोटा ठेवला होता, तिथेच हात धुवायचे.
बांबूच्या फळ्यांचा टेबल आणि बसायला बांबुचेच बाकडे. मनात विचार आला कि आपण जणू टाईम ट्रॅव्हल करून काही वर्षे मागे गेलो असून हा कोणतातरी दुसराच काळ आहे. दहा मिनिटांतच कागदी पत्रावळींवर गरम गरम भात-भाजी आणि लिंबू मिरचीचे लोणचे समोर आले. साधे तरी अतिशय चवदार अन्न. किरणभैय्या भाजलेले पापड घेऊन समोर आलेत. इतर कोणाच्या ताटात तर पापड दिसत न्हवते मग आपल्यालाच खास पाहुणचार का बुआ? तर भैय्या म्हणतात
"हमारे चाचाजी का होटल है ये, और आजके मेहमान आप हो जी"
ओह! तरीच उलगडा झाला कि आल्या आल्या किरणभैय्या बाह्या सरसावून मदतीला का गेले होते ते.
तृप्त मनाने उठलो, हात धुतले. चार थाळ्यांचे वट्ट २८० रुपये बिल झाले होते. भैय्या म्हणाले कि तुम्ही आता आपले आपले फिरून या. तिरथगढ धबधब्याच्या पायथ्याशी जायला इथून सरळ खाली ३०० पायऱ्या आहेत. मात्र ३ वाजेपर्यंत परत या.
भरल्या पोटी निघालो. काही मीटर अंतर चालल्यावर उतरण सुरु होते. काही ठिकाणी व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत, कुठे नुसताच मातीचा उतार आहे तर कुठे पायऱ्या आहेत पण भग्नावस्थेत. इथे जंगली माकडांचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ शक्यतो नेऊच नये किंवा नेल्यास पिशवीच्या आत ठेवावेत. आमच्या समोरच एका कुटुंबाला माकडांच्या टोळीने दरोडा घालून लुटलेले बघितले. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आम्ही जवळची केळी व बिस्किटांचे पुडे तातडीने लपवले.
पन्नासेक पायऱ्या उतरल्यावर ज्योती मावशीला चांगलाच दम लागला. तिला खरंतर सायटिकाचा त्रास आहे, पाय पण ठणकायला लागले. पण तरी उत्साह इतका प्रचंड कि हळूहळू का होईना सर्वांच्या मागोमाग ती उतरत होतीच. हि वळणांची वाट असून घाट उतरल्याप्रमाणे पुढे जावे लागते. प्रत्येक वळणावर जरा मोकळी जागा व काही ठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय केली आहे. पाऊण अंतर उतरल्यावर मात्र मावशी मंडळींनी थांबायचे ठरवले. कारण खाली उतरून तर जाऊ, पण वर चढताना मात्र पुन्हा दमछाक होईल. तिथल्याच एका बाकावर बसल्या. समोर धबधब्याचे दर्शन होत होतेच.
थोडेच अंतर खाली जायचे राहिले होते. आईला म्हटलं "मी आणि विजी पटकन जाऊन येतो तू वाटलं तर थांब मावश्यांसोबत". असं म्हणून आम्ही पुढे निघालो. २५-३० पायऱ्या उतरून धबधब्याच्या अगदी पायथ्याशी पोचलो. आता समोर जाणारच तेवढ्यात पाठून आईची दमदार हाक.
"थांबा गं. खूप पुढे जाऊ नका."
वळून बघितल तर माँसाहेब आमच्या पाठोपाठ हजर. दोघीच गेल्या तर नक्कीच पाण्यात उतरतील ह्याची तिला खात्री होती. माँसाहेबांना आमच्यावर भरोसा नाय.
तीरथगड हा छत्तीसगडचा सर्वात उंच (कि खोल?) धबधबा. हा बारमाही प्रपात कांगेर नदीच्या दोन उपनद्या मूंगा आणि बहार यांनी मिळून बनला आहे. एकच सलग धार नसून ३ वेगवेगळ्या पातळ्यांवरून हा खाली झेप घेतो. ज्याला कंपाऊंड फॉल म्हणतात.
लोक खडकांवर चढून धारांखाली भिजत दंगा करत होते.
उंच कड्यावरून खाली आलेल्या धारा जरा डावीकडे वळण घेतात आणि मधल्या पातळीचा धबधबा निर्माण करतात.
या धारा ओलांडायला एक छोटासा कमानदार पूल बांधला आहे ज्यावरून पलीकडे असलेल्या जुन्या मंदिरसमूहापर्यंत जाता येते.
लोककथेनुसार ११ व्या शतकात तिर्थराज आणि चिंगराज नावाचे दोन भाऊ होते. इथल्या निसर्गसौंदर्याने मोहित होऊन त्यांनी बस्तर प्रदेशाचा या भागात आपली राजधानी वसवली. तीरथराजांनी धबधब्याच्या खालच्या बाजूला आपला गड बनवला आणि वरच्या प्रदेशात तीरथगड गाव वसवले जिथे अजूनही वस्ती आहे.
चिंगराजने तीरथगडपासून ७ किमी अंतरावर चिंगीथराई नावाचे गाव वसवले आणि एक भव्य मंदिर बांधले. त्याचे मात्र आता अवशेष उरले आहेत.
तिसऱ्या पातळीवर एक खोलगट कुंड तयार झाले आहे. हे पवित्र कुंड मानले जाते. या कुंडात आसपासचे आदिवासी आपल्या प्रियजनांच्या रक्षेचे विसर्जन करतात. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. येथून पुढे मूंगा आणि बहार या दोन नद्या 'मुंगाबहार' या नावाने कांगेर नदीला भेटायला प्रस्थान करतात.
विजयालक्ष्मीला पाण्यात भिजायचे होते मात्र इतका वेळ न्हवता. कारण जर का ती एकदा धारांखाली गेली तर कमीत कमी तासाभराची निश्चिती झाली असती. मग फक्त पाय बुडवण्यासाठी १ मोठ्या कॅडबरीची मांडवली झाली. थोडा वेळ तिथे घालवून वर जायला निघालो.
मोठ्या प्रमाणात पर्यटक खेचायची क्षमता असणार्या तीरथगड धबधब्याला नवे आकर्षण देण्यासाठी वन विभागाने इथे जव़ळपास शंभर मीटर लांबीचा काचेचा पुल बनविण्याची योजना आखली आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी आशा आहे. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यातील राजगीर शहरात काचेचा असा पहिला पुल बनविला गेला. हा पुल चीनमधील हौंगझौच्या धर्तीवर उभारला गेला. तीर्थगड इथला पुल जवळपास पाच मीटर उंच असेल. एकावेळी या पुलावर पंन्नास लोक उभे राहु शकतील अशी याची क्षमता आहे. हा पुल इंग्लिश यु ( U ) आकाराचा असेल. आणि यासाठी साधारण तीन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
बरोबर सव्वातीन वाजता पुढे प्रस्थान केले. आजूबाजूचा निसर्ग आता बदलत होता. घनदाट जंगल जाऊन उंच सखल पठारासारख्या भागातून रस्ता जात होता. झाडे पण बरीच विरळ दिसत होती.
हा खरा संवेनदशील भाग. दर १० किमी अंतरावर CRPF चे कॅम्प्स दिसत होते. बाईक्सवर रायफलधारी जवान पेट्रोलिंग करताना दिसू लागले. हीच ती कुप्रसिद्ध 'झीरम घाटी'. इथेच १० वर्षांपूर्वी घडलेली घटना अजूनही अंगावर शहारे आणते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची सुकमा येथील प्रचारसभा आटपून छत्तीसगड काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नंदकुमार पटेल इतर बऱ्याच बड्या काँग्रेस नेत्यांसह जगदलपूरला परतत होते. सोबत मोठे सुरक्षा पथक देखील होते. दुपारी चारच्या सुमारास हा ताफा झीरम खोऱ्यातून जात होता. येथे नक्षलवाद्यांनी झाडे तोडून, ओंडके टाकून रस्ता अडवला. वाहने थांबली आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच झाडांच्या मागे लपलेल्या २०० हून अधिक नक्षलवाद्यांनी धडाक्याने गोळीबार सुरू केला. सर्व वाहनांना लक्ष्य केले. यात नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दीड तास गोळीबार सुरू होता.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षलवादी डोंगरावरून खाली आले आणि प्रत्येक वाहनाची तपासणी करू लागले. क्रॉसफायरमध्ये मारल्या गेलेल्यांना पुन्हा गोळ्या घालण्यात आल्या. चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अजित जोगी वगळता छत्तीसगड काँग्रेसचे त्यावेळचे बहुतांश बडे नेते आणि सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. Sad
वळणदार सुंदर रस्ता. बाजूला तपकिरी माती, हिरवीगार भात खाचरे आणि त्यात काम करणारे शेतकरी बायका-पुरुष दिसत होते. गाई बकऱ्या चरताना दिसत होत्या. नाल्यांत म्हशी डुंबत होत्या. एकामागे एक गावे झपाट्याने मागे जात होती. गाव आले कि रस्त्यात शाळकरी मुले दिसायची. घरांसमोर खाटेवर म्हातारे पुरुष निवांत ऊन खात बसलेले असत, अंगणात कोंबड्या दाणे टिपताना दिसायच्या तर बायका दारात बसून काहीबाही निवडण- टिपण करताना दिसत होत्या. एकंदरीत समाधानी चित्र दिसत होतं. पिक्चर परफेक्ट .
चेकपोस्ट आले. दोघा जवानांनी गाडी अडवून चौकशी केली. सर्वांची ओळखपत्रे आणि वाहन परवाना व इतर कागदपत्रे तपासली आणि गंमतीने म्हणाले "दिदी, इतना गेहरा ‘लाल रंग’ पेहन कर नही घूम सकते आप यहाँ" आणि हसण्याचा गडगडाट करत पुढे जायला परवानगी दिली.
बारसूर युगल-गणेश :-
इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.
येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.
त्यातील प्रमुख एक म्हणजे ११व्या शतकातील चंद्रादित्य मंदिर. या मंदिराला लागून चंद्रादित्याने चंद्रसरोवर देखील खोदले होते, ज्याला आजकाल बुध सरोवर किंवा बुढा तालाब म्हणतात. बुध तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर बस्तरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत अजूनही उभे आहे. मंदिराच्या मागच्या विस्तृत ३० एकर जागेवर राजा बारसूरची/ बाणासुराची गढी होती. चंद्रादित्य नावाच्या सामंताने ह्या मंदिराची निर्मिती केली. तर कोणी म्हणतात कि चंद्र आणि आदित्य नावांवरून त्याचे नाव चंद्रादित्य पडले आहे. यात शिव, विष्णू आणि महिषासुरमर्दिनीची भंगलेली प्रतिमा आहे.
थोड्याच अंतरावर दुसरे शिवमंदिर आहे. कळस नसलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ३२ खांबांचा दगडी मंडप, ज्यात चार ८ असे एकूण ओळींमध्ये 32 खांब आहेत. हे बत्तीशा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
चौकोनी पायावर बांधलेल्या ह्या मंदिराला दोन समान गर्भगृहे आहेत आणि समोर दोघांत मिळून एक विशाल नंदी विराजमान आहे.
जुन्या दंतकथेनुसार या बत्तीस मंदिरातील कोण्या एका खांबामधून एक गुप्त द्वार आहे. या मंदिरातील दोन्ही गाभाऱ्यांमधील शिवलिंग केवळ एका बोटाने गोलगोल फिरवता येते. लोकमान्यतेनुसार हि एक किल्ली असून जर दोन्ही शिवलिंग योग्य त्या पद्धतीने फिरवले तर इथला गुप्त दरवाजा उघडतो. पण काळाबरोबर तो दरवाजा हि आता लुप्त झाला आहे आणि तो पासवर्ड जाणणारा पण कोणी उरला नाही.
फिरते शिवलिन्ग
नंतर आहे इथलं प्रसिद्ध मामा - भांजा मंदिर. इतर मंदिरांच्या तुलनेनं जरा बऱ्या अवस्थेत आहे. या नावामागे पण एक आख्यायिका अशी कि हे मंदिर केवळ एका दिवसात दोन कारागिरांनी जे नात्याने मामा-भाचा होते बांधून पूर्ण केले होते. मंदिराच्या कळसावर उंचावर मामा-भाच्याचे कोरीव शिल्प देखील आहे.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार बारसूरमध्ये ज्या गंगावंशी राजाचे साम्राज्य होते. त्या राजाचा भाचा कलाप्रेमी होता. आपल्या मामा (राजा)ला न कळवता भाच्याने उत्कल देशातून कारागिरांना बोलावून भव्य मंदिर बांधण्यास सुरुवात केली. आपल्या नकळत भाच्याने मंदिरनिर्माण सुरु केले हे बघून राजाचा अहं दुखावला व त्याने भाच्याला युद्धासाठी ललकारले. या युद्धात भाच्याच्या तलवारीने मामाचा मृत्यू ओढावला. पश्चतापदग्ध भाच्याने मग राजा बनल्यावर या मंदिरावर मामाच्या शिराची हुबेहूब प्रतिकृती बसवली. मग भाच्याच्या मृत्यूनंतर त्याच्याही चेहऱ्याची प्रतिमा इथे स्थापन करण्यात आली. या दोन मूर्तींमुळे याला 'मामा-भांजा' मंदिर म्हणतात.
मंदिरावर चहूकडे अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले दिसते.
आता बारसूर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते बारसूर युगल-गणेश. अनेक वर्षं मोकळ्या आकाशाखाली असलेल्या, एकाच वालुकाश्माच्या दगडामधून कोरून काढलेल्या दोन गणेशप्रतिमा येथे आहेत. त्यांपैके मोठी मूर्ती साडेसात फुटाची तरी लहान मूर्ती साडेपाच फुटाची आहे.
पौराणिक कथेनुसार हे मंदिर राजा बाणासुराने बांधले होते. बाणासुराची मुलगी उषा आणि त्याच्या मंत्र्याची मुलगी चित्रलेखा यांची घट्ट मैत्री होती. या दोघींसाठी म्हणून बाणासुराने युगल गणेशाच्या प्रतिमा येथे स्थापन केल्या.
हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले होते. केवळ गणेशप्रतिमा शिल्लक राहिल्या होत्या. मात्र आता या मूर्तींभोवती जुन्याच पायावर नव्याने सिमेंटचे लहानसे देऊळ उभारले आहे.
संकुल परिसरात सर्वत्र दगडांचे अवशेष विखुरलेले आढळतात.
येथील चार मंदिरांची पुरातत्व विभाग पुनर्बांधणी करत आहे.
परंतु इथल्या परिस्थितीमुळे कामाला म्हणावा तसा वेग प्राप्त होऊ शकत नाही.
अनेक मूर्ती, शिवलिंग आणि कोरीव भग्न दगड मोकळ्या आकाशाखाली उघड्यावरच पडलेल्या आहेत.
बुध तलावाच्या पलीकडील बाजूस असलेल्या एका दगड मातीच्या उध्वस्त ढिगाऱ्यात सात घोड्यांच्या रथावर आरूढ असलेली सूर्यप्रतिमा मिळाली आहे. जी गावकऱ्यांनी एक मोठ्या झाडाखाली नुसतीच ठेवलेली दिसते.बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
ढोलकल, दंतेवाडा :-
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः 'पुढे...
बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.
अस्सल ग्रॅनाईटच्या दगडातून कोरून काढलेली हि मूर्ती तज्ज्ञांच्या मते ११व्या शतकातील आहे. साडे तीन फूट उंचीचे आणि ५०० किलो पेक्ष्या जास्त वजनाचे हे बाप्पा कालांतराने लोकांच्या स्मृतीतून नाहीसे झाले होते. अनेक शतकांच्या अज्ञातवासानंतर ते १९४३ साली ब्रिटिशांनी जेव्हा बायलाडिला टेकड्यांमध्ये लोहाच्या खाणी सुरु केल्यात तेव्हा सापडले. तथापि, स्वातंत्र्यानंतर हि गणेशमूर्ती परत एकदा विस्मरणात गेली ते अगदी आत्तापर्यंत.
२०१२ साली दोन पत्रकार खाणींना भेट द्यायला आले असताना सहजच आसपासच्या जंगलात ट्रेक करत पहाडाच्या ढोलकल नामक शिखरावर चढाई केली. या मोहिमेची जणू फलश्रुती म्हणून त्यांना ढोलकल गणेशाचे दर्शन झाले. तेव्हा या पुनःशोधाने आजूबाजूच्या परिसरात बरीच खळबळ उडवून दिली होती.इतके की ढोलकल गणेश मंदिर यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले.
पायथ्याशी वसलेल्या फरसपाल गावापासून ५ किमी अंतराचा हा जंगलट्रेक आहे. अतिशय घनदाट जंगल असल्यामुळे परिसरात एकट्याने फिरायला बंदी आहे. गावातून माहितगार माणूस बरोबर घ्यावा लागतो. तीव्र चढाव असलेला हा ट्रेक बराच कठीण आहे.
अनेक शिखरे असलेल्या या पहाडांवर इतर तीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत त्यांपैकी एक सूर्य मंदिर होते. रोज सकाळी सूर्याचे पहिले किरण इथे पडतात. सूर्यमंदिराच्या समोरच्या शिखरावर खड्या उभ्या कातळावर हा लंबोदर विराजमान आहे. समोरच्या बाजूला एका खांबावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकत असतो.
२०१७ साली काही असामाजिक तत्वांनी या गजाननाला शिखरावरून खाली फेकून दिले होते. मात्र छत्तीसगढ पोलीस, CRPF चे जवान आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून गणेशमूर्तीच्या तुकड्यांचा घनघोर जंगलात शोध घेऊन त्याची पुन:बांधणी केली आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी हा एकदंत आपल्या मूळ स्थानी विराजमान झाला.
पुढील मोठे शहर दंतेवाडा. डंकिनी आणि शंखिणी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे एक शक्तिपीठ. बस्तरच्या कुलदेवीचे स्थान. प्रचंड मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर आज मात्र माओवाद्यांचे एक मोठे केंद्र बनलेले आहे. इतके कि नक्षलवाद = दंतेवाडा असे समीकरणच तयार झाले आहे.
दुपार टळायला सुरवात झाली होती. गाडीने दंतेवाडा शहरात प्रवेश केला, भारतातल्या कोणत्याही छोट्या शहरासारखेच साधे शहर. नदीवर बांधलेला पूल ओलांडून मंदिराच्या आवारात आलो.
अगदी आताआत्तापर्यंत या मंदिरात स्त्रियांना साडी व पुरुषांना धोतर नेसूनच प्रवेश होता. लॉकडाऊन नंतर हा नियम शिथिल केला आहे. तिरंगा चौक ओलांडून गेल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. प्रत्येक तीर्थक्षेत्री असतात तशी ओळीने पूजासाहित्याची, फूला-हारांची दुकाने पार केली कि पांढऱ्या व विटकरी रंगात रंगवलेले भव्य प्रवेशद्वार आहे.
बस्तरची आराध्य देवता व एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या या ठिकाणी देवी सतीचे दात पडले होते म्हणून हि दंतेश्वरी.
आता गेल्यावर विस्तीर्ण चौक आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर भगवान विष्णू दशावतारात विराजमान आहेत. सध्याचे मंदिर १८८० मध्ये वारंगलचा राजा हिराला चितार यांनी बांधले आहे. वारंगलच्या राजांची कुलदेवी दंतेश्वरी होती आणि ते राजे विष्णूभक्तही होते. मुख्य द्वारासमोर काळ्या दगडातील कोरीवकाम असलेला गरुडस्तंभ उभा आहे.
या गरुडस्तंभाला जो कोणी पाठीकडून दोन्ही हातांच्या कवेत घेऊ शकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी समजूत असल्याने प्रत्येकाने आपापले नशीब आजमावले.
मंदिराचे चार भाग पडतात. गर्भगृह, महामंडप, मुख-मंडप आणि सभामंडप. यांपैकी गर्भगृह आणि मुख-मंडप दगडी बांधकामात असून महामंडप आणि सभामंडपाचे लाकडी बांधकाम आहे. हे मंदिर सागवानाच्या 24 खांबांवर उभे आहे ज्यावर ओडिशा शैलीत सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.
गर्भगृहात दंतेश्वरी देवीची सहा हात असलेली काळ्या ग्रेनाईटची मूर्ती आहे. सहा हातांमध्ये शंख, तलवार, त्रिशूल घंटा, श्लोक आणि राक्षसाचे केस धारण केलेले आहेत.
या मंदिराच्या स्थापनेमागे अनेक अनोख्या कथा आहेत. त्यांपैकी एका कथेनुसार बस्तरचा राजा अन्नमदेव जो मुळात वरंगळचा राजा होता त्याला दंतेश्वरी आईने दृष्टांत देऊन दिग्विजय करण्यास सांगितले. देवी म्हणाली कि तू समोर निघ. मी तुझ्या मागे मागे येईन. जिथपर्यंत जाशील तितकी भूमी तुझी. त्याप्रमाणे अन्नमदेव घोड्यावर बसून निघाला. देवी मागेमागे येत होती. मात्र एका ठिकाणी नदी पार करताना राजाला देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही म्हणून त्याने मागे वळून बघितले. तर देवी नदी पार करत होती व पाण्यात पाय असल्याकारणाने पैंजणांचा आवाज येत न्हवता. राजाने वळून बघितल्यामुळे देवी तिथेच थांबली. नंतर राजाने या जागी तिचे भव्य मंदिर उभारले. नदीकाठी देवीचे चरणचिन्ह कोरलेले दिसतात.

डंकिनी व शंखिनी या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर उभे आहे. या दोन्ही इंद्रावती नदीच्या उपनद्या आहेत. डंकिनी नदीचे उगमस्थान डांगरी-डोंगरी आहे आणि शंखिनी नदी जवळच्याच बैलाडिला पहाडावर उगम पावते. डाकिनी आणि शाकिणी या दोन यक्षिणींच्या नावावरून नद्यांना नावे देण्यात आली. या दोन्ही नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यास भूतबाधा नाहीशी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
हे तंत्र साधनेच मोठं केंद्र असून या मंदिरात २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळी दिले जात असत. १८८५ साली शेवटचे १५ नरबळी दिल्याची नोंद ब्रिटिश दप्तरात आहे. मंदिराच्या आत नरबळी देण्याचा दगड अजूनही उभा आहे.
नरबळीची वेदी
आणखी एका कथेनुसार इथल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात डाकिनी आणि शाकिणी आल्या व त्याला मासे पकडण्याचा गळ घेऊन दोन्ही नद्यांमध्ये एक एक वेळा टाकायला सांगितले. तसे केल्यावर डंकिनी नदीमधून डंका सापडला तर शंखिनी मधून एक शंख गळाला लागला. मंदिरात या दोन्ही वस्तू ठेवल्या आहेत. शंखिनी नदी छत्तीसगडमधली सर्वात छोटी व नैसर्गिकरित्या सर्वाधिक प्रदूषित नदी आहे जिच्या पाण्यात अतिशय जास्त प्रमाणात लोह मिसळले गेले असल्याने पाण्याचा रंग लाल झाला आहे. नदीत जलचर नसल्याने व पाणी पिण्यायोग्य नसल्याने व या नदीला मृत नदी असेही म्हणतात.
मंदिरात विशेष गर्दी न्हवती. छान दर्शन झाले. देवीला साडी अर्पण केली. मंदिराच्या आत आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती ठिकठिकाणी ठेवलेल्या आढळतात. काही चांगल्या अवस्थेत आहेत तर काही भग्न.
बाजूलाच भुनेश्वरी देवीचे मंदिर आहे.
आवारात फिरत असतानाच फोन वाजला. माझ्या नवऱ्याचा फोन होता. खरंतर त्याच्याशी सकाळीच बोलणे झाले होते. “जंगलात जात आहोत त्यामुळे एकदम रात्रीच बोलू” असे ठरले असताना अचानक मध्येच कसा काय फोन केला असेल बरं असा विचार करून फोन उचलला तर पलीकडून नवरा पॅनिक झालेला.
"आत्ता कुठे आहात तुम्ही? सुरक्षित आहात ना?" त्याचा काळजीने भरलेला प्रश्न. म्हटलं "काय झालं रे?" नंतर लक्षात आले कि नागपूरहून निघताना त्याला गुगल लाईव्ह लोकेशन शेअर केलेले त्यात आमचे 'दंतेवाडा' हे कुप्रसिद्ध लोकेशन बघून त्याला तिकडे टेन्शन आलेलं. "म्हटलं सगळं ठीक आहे थांब व्हिडीओ कॉल करते." व्हिडीओ कॉलवर मग त्याला पण देवीचं दर्शन करवलंन. विजयालक्ष्मीने तिच्या बाबाला पूर्ण मंदिर परिसर फिरून दाखवला. आणि पुण्यातला जीव भांड्यात पडल्याचा आवाज दंतेवाड्यापर्यंत पोचला.
मंदिर परिसरातून डंकिनी नदीच्या किनाऱ्यापर्यंत जायला पायऱ्यांचा घाट बांधला आहे. तिथे जरा रेंगाळलो.आता संध्याकाळ झाली होती. मावळतीच्या किरणांत नदीचे पाणी लाल सोनेरी रंगांत चमकत होते. काही स्थानिक तरुणी घाटावर आलेल्या दिसल्या. त्यातल्या एकीची विजयालक्ष्मीसोबत गट्टी जमली. त्या ताईने विजीच्या हातातील फुले नदीत प्रवाहित करून दिली. मुलींना टाटा करून परतीचा प्रवास सुरु केला.
परत एकदा पूल ओलांडून मुख्य रस्त्याला लागलो. जवळजवळ ९० किमी अंतर पार करायचे होते. 'लाल-सावलीच्या' या प्रदेशातून खूप रात्र होण्यापूर्वी बाहेर पडणे भाग असते. त्यामुळे गीदम शहर येईपर्यंत कुठेही थांबता आले नाही. बाहेरून रातकिड्यांचा आवाज येत होता. अतिशय व्यस्त दिवस घालवल्यानंतर आता सगळे गाडीत शांत बसून होते.
रात्रीच्या अंधारामुळे म्हणा किंवा मनातल्या भीतीमुळे म्हणा पण आजूबाजूच्या परिसराची जरा जरा भीती वाटायला लागली होती.
गीदम पार केल्यावर आपण कोअर नक्षलवादी भागातून बाहेर पडल्याचे किरणभैय्यांनी जाहीर केले व रस्त्याच्या कडेला एका लहानशा टपरीसमोर गाडी थांबवली. तेथे चहा घेऊन पुढे जगदलपूरच्या दिशेने निघालो. भैय्यांबरोबर दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून सकाळीच ८ वाजता रिसॉर्टवर भेटायचे पक्के करून गाडी नमन बस्तरच्या दारात उभी केली.
रिसॉर्ट वर पोचल्यावर फ्रेश होऊन जरा आराम केला. लॉन वर जागोजागी शेकोट्या लावलेल्या होत्या. त्याचा आस्वाद घेत दिवसभराच्या क्षणांना उजाळा देत एका सुंदर दिवसाची सांगता झाली.

ढोलकल, दंतेवाडा :-
दुसऱ्या दिवशी दि. २८-१२-२०२२ रोजी सकाळीच ७ वाजता तयार होऊन रूम बाहेर पडलो. हवा एकदम स्वच्छ होती. कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ रिसॉर्टच्या आवारात हिंडत फिरत वेळ घालवला. थोडी फोटोग्राफी केली. तिघी जेष्ठ महिला गवतावर निवांत बसून गप्पांचा आस्वाद घेत होत्या तर मी आणि लेकीने झाडाला टांगलेल्या झुल्यावर बसून झोके घेतले. भोजनगृहात जाऊन नाश्ता आटोपला. ठरल्यावेळेवर किरणभैया हजर झाले.
आजच्या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे चित्रकोट धबधब्याला भेट द्यायची होती. शिवाय जगदलपूर शहरात काही विशेष असेल तर ते देखील बघायचं होतं. छत्तीसगढची सांस्कृतिक राजधानी असलेल्या जगदलपूर शहरदर्शनाने आजच्या भटकंतीची सुरवात झाली.
काकतीय वंशातील १३वा राजा दलपत देवाने १७७० मध्ये आपली राजधानी मधोता येथून इंद्रावतीच्या दक्षिण तटावर हलवली आणि त्याचे नाव जगदलपूर ठेवले. राजधानीचे स्थलांतर आणि शहराच्या नामकरणाच्या इतिहासाच्या मनोरंजक कथा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानुसार एके दिवशी राजा दलपत देव आपल्या साथीदारांसह इंद्रावतीच्या या बाजूला शिकारीसाठी आला होता. तेव्हा एका सशाच्या भीतीने त्याचे पाळीव कुत्रे पुढे सरकले नाहीत. हे त्याने आपल्या साथीदारांना सांगितल्यावर या जागेला वीरभूमी मानून राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात मराठ्यांच्या आक्रमणाची भीतीही होती आणि हे देखील राजधानीच्या बदलाचे एक कारण मानले जाते.
१७७० मध्ये जेव्हा काकतियांची राजधानी येथे हलवण्यात आली तेव्हा ही एक ‘महारा’ समाजाची ५० झोपड्यांची छोटीशी वस्ती होती आणि त्याचे प्रमुख जगतु महारा यांच्या नावाने 'जगतुगुडा' म्हणून ओळखले जात असे. जगतूच्या नावातले 'जग' आणि आणि दलपतदेववरून 'दल' हे नाव घेऊन त्याचे नाव ‘जगदलपूर’ पडले. आपल्या कुलदेवीची परवानगी घेऊन महारा समाजाने काकतीय राजांना या ठिकाणी स्थायिक होण्याची परवानगी दिल्याचा उल्लेख आहे. राजा दलपतदेवने शेतीच्या सिंचनासाठी म्हणून इंद्रावतीच्या वळणावर दलपत सागर नावाचा तलाव खोदला जे आज छत्तीसगड मधील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर आहे.

पुढील शंभर वर्षांत येथे ४०० झोपड्या आणि एक 'राजमहाल' असल्याचा उल्लेख आढळतो. हा राजमहाल म्हणजे आकाराच्या दृष्टीने इतरांपेक्षा जरा मोठी, माती - विटांच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली झोपडी. पुढे इंग्रजांची मदत घेऊन इथल्या संस्थानिकांनी लंडनच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्याची योजना केली होती. ब्रिटीश प्रशासक कर्नल जेम्स यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. रस्त्यांचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी पुरेशी जागा सोडण्यात आली. अरुंद गल्ल्या हटवून विस्थापितांना मोकळ्या जागेत स्थायिक करण्यात आले. त्या काळात जातीनुसार मोहल्ले ('पारा-टोला') वसवले. जगदलपूरला 'चौक-चौराहों का शहर' हे विशेषण याच काळात प्राप्त झाले.
आज उभा असलेला राजमहाल मात्र महाराजा भैरमदेव यांनी बांधला. उत्तरेला सिंहद्वारावर दंतेश्वरी मंदिर, राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण, शीतला आणि कर्णकोटीन मंदिरे, दक्षिणेला मावळीमाता, राम आणि जगन्नाथ मंदिरे, पूर्वेला बालाजी मंदिर आणि पश्चिमेला काली कंकालीन मंदिर बांधले गेले व १८९१ मध्ये रुद्रप्रतापदेव सिंहासनावर आरूढ झाले.
इथले शस्त्रागार आणि येथे संग्रहित केलेली स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळातली जुनी छायाचित्रे आणि हा इथला एक महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे राजमहल हा बस्तरमधील काकतीय राजांच्या ७०० वर्षांच्या इतिहासाचा मूक साक्षीदारही मानला जातो.
१८९१ साली राजा भैरम देवाच्या मृत्यूनंतर त्यांचा सात वर्षीय मुलगा रुद्रप्रताप देव बस्तरच्या गादीवर बसला त्यावेळी इंग्रजी राजवट चरम शिखरावर होती. रुद्र प्रताप त्याच्या काकाच्या, कालिंदर सिंहच्या देखरेखीत राज्यकारभार बघू लागला. कालांतराने रुद्र प्रताप उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला असता कालिंदर सिंहने आदिवासी प्रजेला आपल्याकडे वळवून रुद्र प्रतापच्या विरोधात उभे केले.
पुढे रुद्रप्रताप देवच्या निधनानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलीला, प्रफुल कुमारीला बस्तरची कार्यवाही महाराणी घोषित करून तिच्या अल्पवयीन मुलाचा प्रवीरचंद्र भंजदेव याचा राज्याभिषेक केला. प्रफुलकुमारी अतिशय लोकप्रिय महाराणी होती. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची पोस्ट - ग्रॅज्युएट असलेल्या या महाराणीने बस्तरच्या आधुनिक विकासात फार महत्वाचे योगदान दिले आहे. अनेक दवाखाने, शाळा तिने स्थापन केल्या. पुढे अपेंडिसाइटिसच्या उपचारांसाठी तिला लंडन येथे हलवले असता चुकीच्या उपचारामुळे महाराणीच्या मृत्यू ओढवला (काही तज्ज्ञांच्या मते तिला मुद्दाम चुकीची ट्रीटमेंट देण्याचे इंग्रज सरकारचे आदेश होते).

महाराणीच्या मुलगा प्रवीरचंद्र भंजदेव हा बस्तरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय शासक ठरला. १९४८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बस्तर संस्थानाचे विलीनीकरण झाले. त्या काळात बस्तरचे महाराज प्रवीरचंद्र भांजदेव आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय होते. महाराज प्रवीरचंद्रांनी बस्तरच्या आदिवासींसाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे कि आजही त्यांना आदिवासींचा देव म्हटले जाते. आदिवासींचा आवाज लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र 'आदिवासी विकास पार्टी'ची स्थापना केली. त्यांच्या पार्टीने विधानसभेत १० पैकी ९ जागांवर दणदणीत यश मिळवलं होतं. हि पार्टी बस्तरच्या जन, जल आणि जंगल यांच्या कल्याणासाठी कार्यरत होती. पुढे १९६१ भारत सरकारशी झालेल्या मतभेदामुळे मध्ये त्यांनी स्वत:ला भारताच्या राजवटीतून मुक्त करून बस्तरमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला ज्यामुळे त्यांना सरकारने काही दिवस कारावासात टाकले होते. २५ मार्च १९६६ रोजी राजाजींची पोलिसांकरवी गोळीबार करवून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात राजवाड्यातील बरेच लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर भयंकर दंगली उसळल्या. बस्तरच्या जनतेत सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला. सरकारविरोधी द्वेषभावना पराकोटीला पोहोचली आणि याच द्वेषाला आधार बनवत छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी चंचुप्रवेश केला. आणि आज हीच भारताची सर्वात मोठी अंतर्गत समस्या बनली आहे.
सध्या राजमहालात काकतीय घराण्यातील २३वे राजा कमलचंद्र भांजदेव आपल्या कुटुंबासहित राहतात.
जगदलपूर राजमहलच्या आवारातच दंतेश्वरी मंदिर आहे. हिला 'छोटी माँ' म्हणतात. दंतेवाडा येथील दंतेश्वरी देवी 'बडी माँ'. मंदिरात दंतेश्वरी समवेत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीची पूजा-अर्चना होते. मूळ मंदिराप्रमाणेच येथेही (इच्छापूर्ती करणारा) गरुडस्तंभ आहेच. त्याच्याकडे "काल फ्रुटी प्यायल्याने बसलेला घसा लवकर बरा व्हावा" अशी लेकीने इच्छा व्यक्त केली. बाजूलाच दंतेश्वरीची छोटी बहीण मानलेल्या हिंगलाज देवीचे प्राचीन मंदिर पण आहे.
मंदिराच्या महाद्वाराबाहेर चौकात एक लाकडी रथ उभा दिसतो. 'बस्तर दशहरा' या इथल्या प्रसिद्ध दसऱ्याच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या या रथाची कहाणी मोठी रोचक असून ती इथे सांगणे म्हणजे फार अवांतर होईल. (त्यासाठी 'बस्तर दशहरा' वर स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार आहे).
दंतेश्वरीच्या खालोखाल बस्तरचे आराध्य दैवत म्हणजे जगन्नाथ. राजमहाल परिसरात दुसरे प्रमुख मंदिर श्री जगन्नाथाचे आहे. १५व्या शतकात बस्तरचे महाराज पुरुषोत्तम देव हे स्वतः जगन्नाथपुरीला पायी चालत जाऊन प्रभूंच्या मूर्ती घेऊन आले. ज्यांची स्थापना जगदलपूरच्या जगन्नाथ मंदिरात झाली. जगन्नाथपुरीच्या धर्तीवर येथे देखील ऐतिहासिक गोंचा उत्सव साजरा होतो ज्यात बलभद्र-सुभद्रेसहित भगवानांची रथयात्रा निघते.
सध्याचे राजा कमलचंद भांजदेव हे ‘इथल्या भूमीचे पुजारी’ या नात्याने चांदीच्या झाडूने 'छेरा पोरा' विधी करतात. जगन्नाथपुरीत सोन्याच्या झाडूने हा विधी केल्यानंतरच बस्तरमध्ये हा विधी केला जातो.
मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंनी देवड्या असून येथे पहारेकरी राहत असत. आत गेल्यावर एखाद्या जुन्या वाड्याप्रमाणे चारी बाजूंनी अनेक खांबांच्या ओसऱ्या आणि मध्ये विस्तीर्ण चौक आहे. jagannath2.JPG
एका बाजूच्या प्रशस्त दालनात भगवान जगन्नाथाच्या चौदा प्रकारच्या वेशभूषेतील शृंगार केलेल्या प्रतिमा मांडून ठेवल्या आहेत.
समोरच्या सिरसार चौकात बस्तरच्या पुरातात्विक संग्रहालय आहे. थोडं पुढे गेल्यावर दलपत तलावाच्या काठी वेंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. २० वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेले हे मंदिर आज जगदलपूरातील एक प्रमुख धार्मिक स्थळ बनले आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा आकार एखाद्या रथाप्रमाणे आहे.
परिसरात विष्णूच्या दशावतारातल्या प्रतिमा जागोजागी स्थापन केलेल्या आढळतात.
आतमध्ये बालाजीसमोर काही गायक वादक संगीतसेवा देत होते. गरमगरम शिऱ्याचे प्रसाद वाटप चालू होते.
थोडावेळ तेथेच मंडपात बसलो. परिसराचे फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.

चौराहों का शहर - जगदलपूर
जगदलपूरला कसे जाल
जवळचे मोठे शहर :
रस्ता मार्गे
रायपूर अंतर ३०२ किमी. via NH ३०
विशाखापट्टणम : ३०० किमी via NH ३०/ NH ६३
रेल्वे मार्गे
रायपूर - विशाखापट्टणम रेल्वे मार्गाने जोडलेले आहे
हवाई मार्गे
विमानतळ : जगदलपूर विमानतळ
रायपूर - जगदलपूर विमानसेवा आहे.
जगदलपूर शहरातून पश्चिमेकडच्या रस्त्याला गाडी लागली.एकही खड्डा नसलेली काळीभोर डांबरी सडक. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडुलिंब, साल, काटेसावरीचे उंच उंच वृक्ष होते. हि सगळी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. रस्त्याचे नाव 'राम वन गमन पथ' असे आहे.
आजचा निसर्ग कालच्या पेक्षा वेगळा. काल घनदाट अरण्य बघितले तर आज पठारी माळरान. दूरवर नजर जाईल तिथवर लालसर तपकिरी माती. मातीखाली दबलेले पण अर्धवट डोकं वर काढणारे कठीण खडक. आज अधून मधून जरा ढगाळ हवामान होते पण त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता.
जागोजागी शिंदीची झाडे दिसत होती. शिंदीच्या झाडाला इकडे छिंद म्हणतात. गाव लागले कि दूरवर पसरलेली हिरवीगार भात-खाचरे दिसत. त्या हिरवाईत लाल लाल कौलारू घरे. वाटेत एक 'छिंदगाव' नावाचे गाव लागले. इथले मुख्य उत्पन्नाचं साधन म्हणजे म्हणजे शिंदीच्या झाडाचा रस ज्याला 'सल्फी' म्हणतात. हे छत्तीसगढचे खास पेय. नीरेसारखाच झाडाला चिरा देऊन त्यात पाझरणारा रस गोळा करतात. सकाळी घेतलं तर फार पौष्टिक. सूर्य डोक्यावर आला कि मग त्याची ताडी बनते. जागोजागी झाडांना रस काढण्यासाठी मडकी लावून ठेवलेली दिसत होती. काही ठिकाणी सल्फी काढण्याचे काम चालू होते.
गाडीने मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळण घेतलं. आता लालसर कच्च्या मातीची सडक सुरु झाली. या रस्त्याचे नाव 'विनता घाटी'. बरेच ठिकाणी रस्त्याने लोक खांद्यांवर मोठमोठी भांडीकुंडी घेऊन जाताना दिसत होते. मग कळले आज इथला 'जरू तिहार' नावाचा स्थानिक सण आहे. आपल्या नागपंचमीसारखं आज माती खोदत नाहीत किंवा शेतीची कोणतीही कामे करत नाही. पूर्ण दिवस आपल्या कुटुंबियांसह घालवतात.
मटनार टेकड्यांमधेच शहरापासून साधारण ५० किमीच्या अंतरावर तामडा घुमर नावाचा बारमाही धबधबा आहे. तामडा नावाच्या नाल्यावर आहे म्हणून तामडा घुमर. या धबधब्याची विशेषता म्हणजे हा silent fall आहे. अगदी जवळ जाईपर्यंत याची उपस्थिती लक्षात येत नाही. अतिशय कमी आवाज करत कोसळणारा धबधबा आम्ही पहिल्यांदाच पहिला. १०० फुटांवरून खाली झेप घेत तामडा नाला चार किमी अंतर कापून पुढे इंद्रावतीला मिळतो.
गाडी पार्किंगला लावून १०० मीटर चालत गेलं कि आपण थेट धबधब्याच्या माथ्यालाच जाऊन पोचतो. इथे सुरक्षाकुंपण वगैरे काही नाही. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. "घसरला तो पसरला आणि थेट शंभर फूट खाली कोसळला".
नाल्याचं पाणी अतिशय नितळ स्वच्छ त्यामुळे त्याला "नाला का म्हणावं" हा प्रश्न आमच्या शहरी मनाला पडला. लहानशी नदीचं कि हि. इथे बाराही महिने मोरांचे वास्तव्य असते म्हणून याचे दुसरे नाव 'मयूर घुमर'
नदीच्या काठाकाठाने जरा झाडी आहे. छोटासा trail म्हणा. तिथे पलीकडे काही स्थानिक गावकरी कुटुंबे दिसत होती. बायका चुल मांडून स्वयंपाक करत होत्या. पुरुष नदीतून पाणी आणून देत होते तर लहान मुले पाण्यात खेळत होती. त्यांच्या गायी तिथे बाजूलाच चरत होत्या.
म्हटलं “चला, आपण हि तिकडे जाऊया”. झुडपांतून वाट काढत निघालो. मी पुढे, माझ्या मागे विजी, तिच्यामागे आई आणि दोघी मावश्या येत होत्या. अवघड जागा असेल तर मी झुडूप हाताने बाजूला सारून धरायचे आणि मग या साऱ्याजणी तेवढी जागा पार करायच्या असं चाललं होतं. वाट संपता संपता एका अवघड जागी मी झुडूप हलवले आणि दगडावर पाय ठेवणार इतक्यात अगदी जवळून झपकन काहीतरी विजेच्या वेगाने आडवे गेले. बघते तर तपकिरी काळा साप. क्षणार्धात बाजूच्या झाडीत दिसेनासा झाला.
या अनपेक्षित प्रकाराने अंगावर सरसरून काटा आला. रस्ता संपलाच होता. तसेच समोर जाऊन झाडीतून बाहेर पडले. बाकीच्यांना हात देऊन मोकळ्यावर घेतले आणि नंतर नागदेवतेनी दिलेल्या या अकल्पित दर्शनाबद्दल सांगितले.समोर नदी वाहत होती. पात्र अगदीच उथळ आहे. पाण्यात लहान मोठे दगड आहेत तिथे बराच वेळ खेळलो. पाणी छान उबदार होते. पाय सोडून निवांत बसलो.
आमच्या सारखेच अजून काही पर्यटक तिथे आले होते. त्यातील काही लोकांचा धबधब्याच्या अगदी कड्यावर जाऊन पाण्यात उभे राहून सेल्फी घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला. स्थानिक स्वयंपाकवाल्यांनी त्यांना तसे न करण्याबद्दल हटकले असता जरा तू तू मैं मैं करून त्या लोकांनी काढता पाय घेतला.
पुढचा थांबा मेन्द्री घुमर नावाचा मोसमी धबधबा. खरंतर हा एक 'व्यू पॉईंट' आहे. पठाराच्या अगदी कड्यावर जाऊन खाली दरीचे सुंदर दृश्य पाहता येते. इथूनच लांबवर मटनार नाल्यावर स्थित मेन्द्री धबधब्याचे दर्शन होते. पावसाळा नसल्याने अगदी दिसेल न दिसेलशी बारीक धार कड्यावरून कोसळत होती.
मात्र मान्सून मध्ये जेव्हा हा प्रपात आपल्या पूर्ण दिमाखात असतो त्यावेळी त्याला ‘घाटी की धुंध’ असा किताब बहाल केल्या जातो. अलीकडे मोकळे पठार आहे. कड्याजवळचा खडक अगदी कच्चा आहे. सतत खाली दरीत ढासळत असतो म्हणून कड्याच्या थोडे अलीकडे तारेचे कुंपण घातलेले आहे. मघाचेच महाभाग आता कुंपणापलीकडे जाऊन सेल्फी घेताना दिसत होते.
अनवट अस्पर्श निसर्ग. पायाखाली तपकिरी माती आणि लहान मोठे दगड विखुरलेले होते. सहज चाळा म्हणून एक दगड उचलला तर तो आकाराच्या मानाने जरा जड वाटला. इथले सगळेच दगड अंमळ वजनदार लागत होते. मग लक्षात आले कि हे साधे दगड नसून नक्कीच कोणतीतरी खनिजे आहेत. कदाचित लोह किंवा मँगनीज. भूविज्ञानाच्या अभ्यास करत असतानाचे दिवस आठवले. भारताच्या नकाशातील खाणींचे विभाग आणि खनिज संपत्तीचे वितरण. Ph.D करत असताना केलेली सर्वेक्षणे डोळ्यासमोरून तरळून गेली. छान वाटले. nostalgia. अशा शांत जागी बसून एकटीनेच स्मरणरंजन करण्यातही मजा आली. इथून पाय निघत न्हवता. जरा वेळाने निघालो. गाडीत येऊन बसलो पण मन त्या पठारावरच अडकले होते.
रस्त्यात एका ठिकाणी थांबून जेवणे उरकलीत. मेनू तोच. भात, भाजी व लोणचे. नॉनव्हेजचे मात्र बरेच प्रकार होते. देसी भूना मुर्ग आणि चापड़ा चटनी (लाल मुंग्यांची चटणी) हि इथली वैशिष्ट्ये. झाडांवर घरटे करून राहणाऱ्या या मुंग्यांना मीठमिरीबरोबर वाटले कि झाली बेसिक चटणी तयार.
आता दुपार टळायला सुरवात झाली होती. अजून आजचे खास आकर्षण बाकी होते. किंबहुना मुद्दामच चित्रकोट भेट सर्वात शेवटी ठेवली होती. भारतातील प्रमुख धबधब्यांपैकी एक आणि सर्वात रुंद व मध्य भारतातील सर्वात मोठा जलप्रपात असलेल्या चित्रकोटच्या रस्त्याला लागलो. हा धबधबा जगदलपूरपासून ४० कि.मी आणि रायपूर पासून 273 कि.मी. अंतरावर आहे. ३० मीटर उंचीचा हा फॉल सुमारे ३०० मीटर रुंद आहे. इंद्रावती नदीवर असलेल्या या प्रपाताला घोड्याच्या नालेसमान आकारामुळे भारताचा नायगारा देखील म्हटले जाते.
इंद्रावती नदी ओडिशातील कालाहांडी येथे उगम पावून महाराष्ट्र - छत्तीसगढ - तेलंगणा सीमेवर गोदावरीला मिळते. इंद्रावती नदीच्या निर्मितीमागे एक पौराणिक कथा आहे. एकेकाळी ही जागा चंपा आणि चंदनाच्या झाडांनी भरलेली होती, ज्यामुळे संपूर्ण जंगल सुगंधित होत असे. या सुंदर ठिकाणीं एकदा इंद्र आणि इंद्राणी काही काळासाठी राहायला आले. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत जंगलात फिरत असताना इंद्र एका उदंती नावाच्या वनकन्येवर भाळला. दोघे सोबत राहू लागले. इकडे इंद्राणीला या बाबत आदिवासींकडून कळले असता तिने चिडून दोघांना वेगळे होण्याचा शाप दिला आणि स्वतः स्वर्गलोकी परत न जाता तिथेच जन कल्याणासाठी राहण्याचा निश्यय केला आणि स्वतःला नदीच्या रूपात प्रवाहित केले. हीच इंद्रावती नदी. एकाच पहाडावर उगम पावलेल्या इंद्रावती, इंद्रा आणि उदंती या तीन नद्या कुठेही एकमेकांना न भेटता वाहतात.
चित्रकोट आल्याची खबर लांबवरून येणाऱ्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने मिळाली. पार्किंगला गाडी लावून चालत निघालो. रस्त्याच्या दुतर्फा सोव्हिनर्स, स्थानिक चीजवस्तू विकणारी दुकाने होती पण येताना बघू म्हणत पाय भराभरा उचलत धबधब्यापाशी पोचलो. आणि … निशब्द...
निसर्गाचा विराट आविष्कार..
प्रथम तुज पाहता ... समर्थांचे सुप्रसिद्ध काव्य आठवले.
।। गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।
पांढऱ्या शुभ्र जलधारा प्रचंड वेगाने कड्यावरून खाली कोसळत होत्या. पर्यटकांची बरीच गर्दी होती. पण जागोजागी कुंपणे आणि रक्षक गस्त घालत असल्याने व्यवस्थित सुरक्षा होती.
किती बघू आणि काय बघू असे होत होते. बरेच फोटो काढले तरी समाधान होईना. खाली जायला पायऱ्यांची वाट बांधली आहे. त्यावरून खाली जायला निघालो. अर्ध्या वाटेवर एक फाटा 'चित्रकोट नेचर ट्रेल' कडे जातो.
१० मिनिटात खाली नदीकाठी पोचलो. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जायला नावा उपलब्ध आहेत. एका वेळेला दहा जणांना वल्हीच्या नावेत बसून जात येतं. तसेच सिंगल मोटारबोटीची सोयदेखील आहे. लाइफ जॅकेट चढवून नावेत स्वार झालो.
दोन नावाडी चप्पू चालवत होते. त्यांनी अर्धवर्तुळाकार मार्गाने नेत धबधब्याच्या अगदी जवळ नेले. कोसळणाऱ्या प्रपाताचा भयंकर आवाज येत होता.
।। गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला,
कड्याशी आदळे धारा, वात आवर्त होत असे ।।
पाण्याशी तुषार उडून पांढरे धुके तयार झाले होते. अंगावर थंडगार तुषारांचा वर्षाव झाला. कपडे, चष्मा, केस, कॅमेरा, मोबाईल सगळ्यांवर पाण्याचे बारीक बारीक थेंब चमकायला लागले.
।। तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात,
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ।।
कड्याच्या पायथ्याशी, धारांच्या मागे, घळ तयार झाली आहे. घळीमध्ये दुर्गादेवीच्या प्राचीन मूर्ती आणि अनेक शिवलिंग आहेत. कोसळत्या जलधारांनी त्यांच्या अखंड अभिषेक चालू असतो. खूपच अद्भुत दृश्य होते.
।। कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ।।
नावेने वळण घेतले, धबधब्यापासून थोडं दूर निघालो आणि सूर्यनारायणाने कृपा केली. ढग बाजूला होऊन उन्हाची एक तिरीप थेट धारांवर आणि ... कमानदार इंद्रधनुष्य अनपेक्षितरित्या साकार झाले. एक विलक्षण सुंदर अनुभव घेतला.
मनोऱ्याच्या मागच्या बाजूने एक वाट खाली उतरते. चांगला बांधलेला जिनाच इथे आहे. तिथून खाली उतरून आपण नदीच्या पात्राजवळ पोहोचतो. काठाने वाढलेल्या झाडीतून वाट काढत प्रवाहाच्या डाव्या अंगाने धबधब्याजवळ पोहचतो. पाण्याचा प्रवाह कमी असतो तेव्हा त्या वाटेने चक्क मुख्य धबधब्याच्या मागे जाता येते. पण जर प्रवाह चांगलाच भरात असेल तर दगड निसरडे झाले असतील तर ठराविक अंतरापर्यंतच जायला मुभा असते.
धबधब्याच्या समोर घेऊन जाणारा नावाडी
चिंचोळी वाट
 |
अद्भुतरम्य जागा
 | उन्हं वर आल्यावर चकाकणारे धबधब्याचे पाणी
|
|
डावीकडे उंच कडा आणि उजवीकडे नदीचे पात्र अशा चिंचोळ्या पट्ट्यातून वाट धबधब्याच्या थेट खाली जाते. कड्याच्या पोटात काही गुहा खोदलेल्या दिसतात. त्यात काही शिवलिंगे आणि कोरीव मूर्तीही दिसतात. कधी काळी इथे एखादे मंदिर असावे. अस्ताव्यस्त पसरलेल्या शिळा, बाजूला विखुरलेले कोरीव भग्नावशेष, आणि समोरचा तो महाकाय जलप्रपात त्या जागेला एक अद्भुत आयाम देतो.
परत काठावर आलो. आज्जीमंडळी परतीच्या वाटेला लागल्या. आम्ही दोघी मायलेकी मात्र बराच वेळ नदीकाठावरच रेंगाळलो. दगडावर बसून खूप गप्पा केल्या,
संध्याकाळ झाली होती. परतीच्या वाटेवर एक शिव मंदिर आहे. तिथे सगळ्या आमची वाट बघत बसल्या होत्या. जाताना बस्तर आर्टची बरीच दुकाने आहेत. कास्ट आयर्न चे हत्ती घोडे, लाकडी खेळणी, विंड चाइम्स असे बरेच काही विकायला होते. थोडीफार खरेदी केली. रिसॉर्टवर आलो. गाडीचा हिशोब चुकता केला.
आज रायपूरसाठी निघायचे होते. रात्री उशिराची बस होती. दहा वाजता चेकआऊट करून जगदलपूर मेन बस स्टॅन्ड गाठला. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. इंद्रावतीचा पूल पार करून गाडीने वळण घेतले. शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते आणि आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
बस्तर आर्ट व रायपूर :-
शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते. आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
पुढे…
भल्या पहाटे रायपूरच्या बस स्टॅन्डवर गाडी पोचली. कोणताही प्रवास असो, मला शक्यतो वाहनात झोप लागत नाही त्यामुळे घरी जाऊन छोटीशी झोप काढली. उठून ताजेतवाने होते तो मावशीच्या हातचा गरमागरम नाश्ता समोर हजर. त्यावर ताव मारत आजच्या दिवसाचे प्लॅनिंग सुरु होते. सिरपूरला जैन मंदिरांच्या पुरातात्विक स्थळाला भेट द्यायची होती पण ते ठिकाण काही कारणामुळे तात्पुरते बंद आहे असे समजले. मग मावशी म्हणाली कि चला आपण 'पुरखौती मुक्तांगणा'ला भेट देऊया.
रायपूर पासून २० किमी अंतरावर मोकळ्या प्रांगणात वसलेले हे ‘बस्तर आर्ट’ चे मोठे केंद्र आहे. ज्यामध्ये छत्त्तीसगडमधील समृद्ध आदिवासी संस्कृती, लोककला, ग्रामजीवन, प्रमुख पर्यटन स्थळे इत्यादी प्रदर्शित करण्यात आले आहे.
२०० एकर जागेवर पसरलेल्या या मुक्तांगणात प्रामुख्याने बस्तर आर्ट या कलाप्रकाराला विशेष महत्व असून यात भांडी, हस्तकला, शिल्पकला इत्यादी बघावयास मिळतात.
बस्तरच्या आदिवासी समुदायात पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंतु प्रसिद्धीच्या अभावी ती स्थानिक हाट आणि बाजारांपुरती मर्यादित असलेली हि कला आता जगभरात ‘बस्तर आर्ट’ या नावाने ओळखली जाते. आधुनिक यंत्रांचा वापर न करता पारंपरिक साधनांनी केलेल्या लाकूडकाम, बांबूकाम, मातीकाम (टेराकोटा) आणि धातूकला यांचा समावेश होतो. यातही बस्तर संस्कृती, सण, देवी-देवतांच्या मूर्ती व प्राणी बनवण्यासाठी लाकडी कलाकृती; घराच्या सजावटीसाठी बांबूच्या चादरी, खुर्च्या, दिवाणखाना, टेबल, टोपल्या, चटई, इ वस्तू; टेराकोटाच्या देवांच्या मूर्ती, सजावटीची भांडी, फुलदाणी, भांडी आणि घरगुती सामान बनवले जाते. मेटल आर्ट्समध्ये तांबे आणि कथील मिश्रित धातूच्या कलाकृती बनविल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीच्या शोभेच्या मूर्ती आणि गृहसजावटीचे सामान तयार केली जाते.
मुक्तांगणात या सगळ्यांचे प्रदर्शन मांडले आहे. स्थानिक आदिवासी घरांच्या प्रतिकृती, व्यवसायानुरूप घरांच्या वेगवेगळ्या रचना, प्रसिद्ध स्थानांच्या मूळ आकारातील प्रतिकृती बघायला मिळतात.
इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घोटुल. घोटुल इथल्या आदिवासींच्या परंपरेचा भाग आहे. घोटुल म्हणजे एकप्रकारचे यूथ होस्टेल. अविवाहित मुले मुली गावाबाहेरच्या एका मोठ्या घरात काही दिवस एकत्र राहून आपापल्या जीवनासाथीची निवड करतात. हे घोटुलची पूर्ण व्यवस्था मुले मुली मिळूनच बघतात. स्वयंपाकापासून तर रंगरंगोटी, डागडुजी व इतर सर्व कामे. सायंकाळी त्या समाजाशी संबंधित नृत्य-संगीत, कला आणि कथाही घोटुलमध्ये सांगितल्या जातात. इथे विवाहितांना प्रवेश नाही.
मुक्तांगणात बराच वेळ घालवून परत आलो. दुपारी ज्योती मावशीकडे चहाचे आमंत्रण होते.
सायंकाळी रायपूर पासून १७ किमी अंतरावर असलेल्या 'चंदखुरी' येथील कौसल्या मंदिराला भेट द्यायचे ठरले. रामायणातील दक्षिण कोसल म्हणजे आजचे बस्तर. राणी कौसल्येचे माहेर.
मूळचे 'चंद्रपुरी' असे नाव असलेले हे गाव कोसला जनपदाची राजधानी होती. कौशलचा राजा भानुमंताची कन्या कौशल्या हिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथ याच्याशी झाला होता.राजा भानुमंतने कौसल्येला लग्नात दहा हजार गावे भेट म्हणून दिली होती. त्यात तिचे जन्मस्थान चंद्रपुरीचाही समावेश होता. मंदिरात माता कौशल्याची व बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापन केलेली आहे.
प्रभू राम वनवासातून आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघी चांदखुरी येथे येऊन राहिल्याची कथा या भागात प्रचलित आहे. इथल्या प्राचीन चंद्रसेन तलावाच्या मधोमध ७व्या शतकात हे श्रीराम आणि कौसल्येचे मंदिर निर्माण केले. गमतीची गोष्ट म्हणजे विस्मरणात गेलेल्या या मंदिराचा शोध एका म्हशीमुळे लागला. चंद्रसेन तलावाच्या मधोमध असलेल्या एका बेटावर हि म्हैस पोचली आणि परत येता येईना म्हणून तिची सुटका करण्यासाठी गावकरी तेथे गेले आणि त्यांना हे मंदिर भग्नावस्थेत सापडले. २०२१ साली मंदिरा मूळ आराखडा कायम ठेऊन परिसराचे नूतनीकरण व तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले.

जुन्या मूर्तीच्या बरोबरीने एक आधुनिक पद्धतीची अतिशय देखणी प्रतिमा पण येथे स्थापन केली आहे. देवासमोर हात जोडून उभे असता विजयलक्ष्मीने उत्स्फूर्तपणे गाण्याच्या क्लास मध्ये शिकलेले 'कौशल्या दशरथ के नंदन" हे भजन म्हणायला सुरवात केली. खड्या आवाजात तालासुरात भजन म्हणता असताना आजूबाजूला बराच श्रोतृवर्ग गोळा झाला. शेवटच्या 'राम सिया राम' या ओळींना तर सर्वानी एकसुरात साथ दिली. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विजी अचानक सेलेब्रिटी बनली.
या गावाचे आणखी एक प्रचलित नाव म्हणजे ‘वैध चांदखुरी’. एका कथेनुसार राम रावण युद्धात लक्ष्मणावर उपचार करणाऱ्या सुषेण वैद्यांचा इथे आश्रम होता. वाली पत्नी ताराचे वडील असलेल्या वानरश्रेष्ठ सुषेण वैद्यांचे दंडकारण्य हे मूळ निवासस्थान होते. राज्याभिषेकानंतर श्रीरामाने वैद्यराजांना आपल्या आजोळी चंद्रपूरीला येऊन राहण्याची विनंती केली व इथे आयुर्वेदिक प्रयोगशाळा व उपचारकेंद्र स्थापन करून दिले. वैद्यकशात्रावरील काही प्राचीन भूर्जपत्रे आजूबाजूंच्या गावात सापडली आहेत. इथेच सुषेण वैद्यांची समाधी आहे.
अतिशय रमणीय परिसरात वसलेल्या या मंदिराची भेट घेऊन रायपूर शहरात रात्रीचा फेरफटका मारला.
मोतीबाग परिसरातील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये जाऊन चवदार भोजनाचा आस्वाद घेतला. ज्योती मावशीचा निरोप घेऊन घरी आलो. रात्री उशीर झाला तरी गप्पा काही संपेना. रंजू मावशी आणि माझी आई या दोघी मावस बहिणी. कितीतरी वर्षांनी निवांत भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मावशी म्हणाली "४० वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पण इतक्या वर्षांत माहेरचे कोणी पहिल्यांदाच असे निवांत येऊन राहिले आहे. खूप छान वाटलं".
पुन्हा एकदा 'वंदे भारत एक्सप्रेस' नी नागपूरला परतलो. घरी आलो तर विजयालक्ष्मीचा बाबा सरप्राईज भेट द्यायला हजर होता. दिवसभर विजयालक्ष्मीची बाबाच्या गळ्यात पडून ट्रिपच्या गमती सांगत उजळणी सुरु होती. आपण सर्वांनी जायचं परत एकदा रंजू आज्जीकडे जायचं असा निश्चय करून एक सुंदर ट्रिप ची सांगता झाली.
छत्तीसगडमधील धार्मिक स्थळे :-
छत्तीसगड राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे. येथे लोक सर्व हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरे करतात. छत्तीसगडमधील बहुतेक सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. परंपरेने मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक प्रमुख सण म्हणजे नवरात्र (नवरात). छत्तीसगडमध्ये देवीच्या अवतारांची वेगवेगळ्या नावाने पूजा करण्याची परंपरा आहे, जसे की देवी दाई, डोकरी दै. छत्तीसगढ़ी भाषेत आईला ‘दै’ म्हणतात.
तुम्ही छत्तीसगडचे रहिवासी असाल किंवा छत्तीसगडला भेट देण्यासाठी आला असाल, तर छत्तीसगडमध्ये नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा तुम्ही अवश्य पाहा. छत्तीसगडमधील काही पारंपारिक आणि ऐतिहासिक देवी (माता) मंदिरांची यादी खालीलप्रमाणे आहे जिथे तुम्ही भेट दिली पाहिजे:
बंबलेश्वरी मंदिर: -
हे मंदिर छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३६ किलोमीटर अंतरावर डोंगरगड आहे. डोंगरगड हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे माँ बमलेश्वरीचे हजारो वर्षे जुने मंदिर आहे. १६०० फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी १००० पायऱ्या चढाव्या लागतात. माँ बमलेश्वरी शक्तीपीठाचा इतिहास २२०० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.
येथे बमलेश्वरी मातेची दोन मंदिरे आहेत. पहिली एक हजार फुटांवर वसलेली आहे जी बडी बमलेश्वरी म्हणून ओळखली जाते. माँ बमलेश्वरीच्या मंदिरात दरवर्षी नवरात्रीच्या काळात दोनदा मोठी जत्रा भरते ज्यात लाखो भाविक सहभागी होतात. डोंगरगड हे निसर्गसौंदर्याने नटलेले असे ठिकाण आहे जे सर्व बाजूंनी हिरवेगार डोंगर, पश्चिमेला लहान-मोठे तलाव आणि पाणियाजोब जलाशय, उत्तरेला धारा जलाशय आणि दक्षिणेला मडियान जलाशय आहे.
उत्सव:
टेकडीवर बागुलमुखी (बमलेश्वरी) मंदिर आहे. शरद ऋतूतील आणि वसंत ऋतूतील नवरात्रीत भव्य जत्रेचे आयोजन केले जाते.
इतिहास:
डोंगरगडचे प्राचीन नाव कामवतीपुरी आहे. येथे पुरातन तलावांचे अवशेष सापडले आहेत. सुमारे २२०० वर्षांपूर्वी, कामवतीपुरीचा राजा वीरसेन याने डोंगरगडच्या डोंगरावर महेश्वरी देवीचे मंदिर बांधले होते. राजा विरसेन हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्यचा समकालीन मानला जातो. मुलाच्या जन्माच्या स्मरणार्थ त्यांनी मंदिर बांधले होते.
भारत सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत डोंगरगडमधील विविध विकास कामे आणि सुशोभीकरणासाठी ४३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर ( २०२० ) करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत माँ बमलेश्वरी मंदिराच्या पायऱ्यांवर पर्यटन सुविधा, पार्किंग आणि तलावाचे सुशोभीकरणही करण्यात येणार आले. तसेच भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य आकर्षण येथे बसविण्यात येणारे श्रीयंत्र असेल.
खल्लारी माता :-
खल्लारी हे छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यात वसलेले गाव आहे. महासमुंद जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाच्या दक्षिणेस २५ किमी अंतरावर खल्लारी गावाच्या डोंगरमाथ्यावर आहे. जगन्नाथ मंदिर येथे आहे. हे स्मारक छत्तीसगड राज्याने संरक्षित केले आहे. खल्लारी राजधानी रायपूरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. येथे माता खल्लारी देवीचे मंदिर आहे.
इतिहास:
असे मानले जाते की महाभारत काळात भीमाने मारलेल्या हिडिंब या राक्षसाचे राज्य होते. भीमाच्या सौंदर्याने आणि सामर्थ्याने प्रभावित होऊन हिंडीबाची बहीण हिंडीबा हिचा विवाह याच ठिकाणी झाला.
खल्लारीचे प्राचीन नाव मृत्कागढ, खल्वाटिका असे होते. जेव्हा कलचुरी राजघराण्याची लाहुरी शाखा रायपूरमध्ये स्थापन झाली तेव्हा त्यांची सुरुवातीची राजधानी खल्लारी होती. इ.स.१४०९ मध्ये ब्रह्मदेव रायच्या कारकिर्दीत राजधानी खल्लारीहून रायपूरला हलवण्यात आली.
ब्रह्मदेव राय यांच्या कारकिर्दीत, देवपाल नमक मोची यांनी १४१५ मध्ये खल्लारी येथे विष्णू मंदिर बांधले.
खल्लारी माता मंदिर:
हे मंदिर खल्लारी गावात डोंगरावर आहे. या ठिकाणी लोकांची खूप श्रद्धा आहे. १९४० मध्ये येथे पहिल्यांदा पायऱ्या बांधण्यात आल्या. खल्लारी माता मंदिरापर्यंत जाण्यासाठी ८५० पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यानंतर येथे वेळोवेळी बांधकामे सुरूच राहिली. १९८५ मध्ये नवरात्रीच्या काळात प्रथमच ज्योती कलशाची रोषणाई सुरू झाली.
उत्सव:
चैत्र महिन्यातील पौर्णिमेला या गावात वार्षिक जत्रा भरते. जे देवीच्या सन्मानार्थ केले जाते. ही जत्रा ७ दिवस चालते. दरवर्षी कावड आणि चैत्र नवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
चंडी मंदिर: -
चंडी माता मंदिर हे महासमुंदच्या दक्षिणेस ४० किमी अंतरावर बागबहरा परिसरातील घुंचपली गावात आहे. जिथे चंडी देवीची नैसर्गिक मूर्ती आहे. दरवर्षी चैत्र व कार्तिक महिन्यात नवरात्री येथे जत्रा भरते. दररोज सायंकाळी भाविकांसह अर्धा डझन अस्वलही मातेच्या आरतीत सहभागी होण्यासाठी येथे येतात. या अस्वल जणु भाविक व ग्रामस्थांना साथ देतात.
दंतेश्वरी माता मंदिर :-
दंतेश्वरी माता मंदिर दंतेवाडा जिल्ह्यातील जगदलपूर शहरापासून सुमारे ८४ किमी अंतरावर डंकिनी-शांकिनी संगमावर वसलेले आहे. हे ५२ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. येथे देवी सतीचा दात पडला होता असे मानले जाते, त्यामुळे हे नाव दंतेवाडा पडले. हे मंदिर काकतीय राजघराण्यातील शासकांनी बांधले होते. दंतेश्वरी माता ही बस्तर राजघराण्याची कुलदेवता आहे.
मदवरानी मंदिर :-
छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यातील कोरबा-चंपा मार्गावर कोरबापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर एका छोट्या डोंगरावर मदवरानी मंदिर आहे. मडवा म्हणजे मंडप. स्थानिक मान्यतेनुसार मां मदवरानी स्वतः येथे प्रकट झाली होती.
कोसगाई माता मंदिर :-
हे मंदिर कोसगाईगड नावाच्या गावात कोरबा-काटघोरा रस्त्यापासून २५ किलोमीटर अंतरावर फुटका डोंगराच्या डोंगराळ भागात आहे. हे ऐतिहासिक मंदिर आहे. येथील मंदिर १६ व्या शतकात बहरेंद्र साईंच्या काळात बांधले गेले.
महामाया मंदिर :-
महामाया मंदिर हे बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर येथे असलेले एक प्राचीन मंदिर आहे. महामाया मंदिर १२-१३ शतकात कलाचुरी राजा रत्नदेव प्रथम याने बांधले होते. मान्यतेनुसार रतनपूर येथे देवी सतीची उजवी कवटी पडली होती. हे ठिकाण बिलासपूरपासून सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर आहे.
चंद्रहासिनी माता मंदिर :-
हे मंदिर शक्ती जिल्ह्यातील दाभ्रा तालुक्यातील चंद्रपूर येथे आहे. हे अतिशय प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे संबलपूरचा राजा चंद्रहास याने मंदिराचे बांधकाम आणि देवीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. देवीच्या मुखाचा आकार चंद्रहास म्हणजेच चंद्रासारखा चेहरा असल्यामुळे तिला "चंद्रहासिनी देवी" असे म्हणतात. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या चंद्रहासिनी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर नाथलदाई मंदिर आहे. श्रद्धेनुसार माता चंद्रहासिनीचे दर्शन घेतल्यानंतर माता नाथलदाईचेही दर्शन घेणे आवश्यक आहे.
उमा देवी मंदिर :-
उमा देवी मंदिर, देवी पार्वती किंवा गौरीला समर्पित, कांकेर-नारायणपूर मुख्य रस्त्यावरील नरहरपूर भागामधील रिसेवाडा गावात आहे. हे १२ व्या शतकात सोमवंशाच्या काळात बांधले गेले. या मंदिरात भगवान शिव, देवी पार्वती आणि इतर अनेक देवींच्या दगडी मूर्ती आहेत. या मंदिराजवळ एक लहान तलाव आहे. यामध्ये लोक पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून पूजा करतात. मंदिराच्या बांधकामाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पण सोम वंशातील राजांनी कांकेर राज्यात अनेक भव्य मंदिरे बांधली होती असे मानले जाते.
आई अंगारमोती :-
धमतरी जिल्ह्यात दोन ठिकाणी माता अंगारमोतीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मातेचे पाय गांगरेलमध्ये, तर मातेचे धड रुद्रीरोड सीताकुंडमध्ये स्थापित केले आहेत. तलावातील मच्छिमारांच्या जाळ्यात हे मुर्तीच्या शरीराचा भाग अडकलेला आढळून आला आणि मच्छिमारांनी तो सामान्य दगड असल्याचे समजून तो पुन्हा तलावात फेकला. त्यानंतर गावातील एका व्यक्तीला हा दगड म्हणजेच मातेचे रूप आहे हे कळले आणि नंतर ती तलावातून बाहेर काढून जवळच्या झाडाखाली बसवली.
माता शबरी मंदिर :-
जर आपण माता स्मरण करत असतो तर ज्यांना स्वतः भगवान रामाने माता म्हटले त्यांना आपण कसे विसरणार? माता शबरीला समर्पित हे प्राचीन मंदिर खरौड येथे आहे. माता शबरीला समर्पित हे एकमेव प्राचीन मंदिर आहे.
माता कौशल्या मंदिर :-
चांदखुरी हे छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून २७ किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे. हे भगवान रामाची आई कौशल्या जी यांचे जन्मस्थान मानले जाते. गावातील जलसेन तलावाच्या मधोमध माता कौशल्येचे मंदिर आहे, त्यामध्ये माता कौशल्याच्या मांडीवर बसलेली भगवान श्रीरामाची मूर्ती आहे.
या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. यामागची श्रद्धा अशी होती की इथे प्रभू राम आईच्या कुशीतल्या मुलाप्रमाणे आहेत, अशा स्थितीत इतर स्त्रिया इथे येऊन भगवान श्रीरामाकडे बघतील. पण, कालांतराने महिलांनाही प्रवेश देण्यात आला.
इतिहास
हे मंदिर सोमवंशी राजांनी ८ व्या शतकात बांधले होते. लोककथांनुसार, आई कौशल्याने राजाला स्वप्नात दर्शन दिले आणि आपण या ठिकाणी असल्याचे सांगितले. राजाने आपल्या लोकांना त्या ठिकाणी खोदायला लावले. या उत्खननात सापडलेली मूर्ती एका भव्य मंदिरात बांधून त्यात स्थापित करण्यात आली होती. १९७३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
या गावाला औषधी ग्राम किंवा वैद्य चांदखुरी असेही म्हणतात. सुशेन वैद्य यांचा येथे आश्रम होता, अशी त्यामागची धारणा आहे. गावात सुषेण वैद्य यांचे मंदिर बांधले आहे, त्यात एक मोठा दगडही ठेवला आहे, असे मानले जाते की या दगडावर सुषेण वैद्य बसत असत.
मंदिराचे महत्व
या मंदिरात ग्रामस्थ दिवे लावून दिवाळी साजरी करतात. येथे दिवे लावूनच गावातील लोक आपापल्या घरी पूजा करतात.
अष्टभुजा माता :-
अष्टभुजा मातेचे मंदिर साकटी जिल्ह्यातील मलखौदा तालुक्यातील अडभर येथे आहे. हे ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे. हे भारतातील काही दक्षिणाभिमुख काली मंदिरांपैकी एक आहे.
गणपती मंदीरे :-
छत्तीसगड राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय शोधांवरून हे सिद्ध झाले आहे की, राज्यात हजारो वर्षांपासून गणेशाची पूजा केली जात आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या या यादीत अशा प्राचीन मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.
 |
| ढोलकल गणेश |
बरसूर:-
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात बरसूर हे गाव आहे. जे जिल्हा मुख्यालयापासून ३४ किलोमीटर अंतरावर आहे. बरसूर ही नागा राजांची आणि काकतीय शासकांची राजधानी आहे.
बारसूर हे तलाव आणि मंदिरांचे शहर म्हटले जाते.११ व्या आणि १२ व्या शतकात बारसूरमध्ये १४७ मंदिरे आणि तलाव होते. इसवी सन १०६० मध्ये, छिंदक नागवंशी राजा जगदेकभूषण, धारावर्षचा सरंजामदार चंद्रादित्य याने शिवमंदिर बांधले आणि तलाव खोदला. बस्तर विभागातील बारसूर येथे असलेली गणेशमूर्ती ही जगातील तिसरी सर्वात मोठी गणेशमूर्ती आहे. येथील जुळ्या गणेश मंदिरात दोन गणेशमूर्ती आहेत. एकाची उंची सात फूट तर दुसऱ्याची पाच फूट आहे. बरसूरची ही मूर्ती एका दगडात बनवली आहे. मान्यतेनुसार हे मंदिर बाणासुर राजाने बांधले होते. राजाची मुलगी आणि तिची मैत्रिण या दोघांनीही गणेशाची आराधना करायची होती. मात्र या परिसरात एकही गणेश मंदिर नव्हते. त्यामुळे राजाच्या मुलीला गणेशाची पूजा करण्यासाठी दूरवर जावे लागले. राजाने आपल्या मुलीच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधले होते.
येथील प्रसिद्ध मंदिरांमध्ये मामा-भंजा मंदिर (मूळचे शिव मंदिर), चंद्रादित्य, गणेश मंदिर, बत्तीसा/बत्तीसी मंदिर यांचा समावेश आहे. येथील मंदिरे धारवर्षाच्या काळात त्याच्या सामंत चंद्रादित्याने बांधली होती.
मामा-भांजा मंदिर :-
हे दोन गर्भगृहे असलेले मंदिर आहे, त्यांचे मंडप एकमेकांना जोडलेले आहेत, येथील उध्वस्त झालेल्या मंदिरांमध्ये कामशिल्प भग्नावस्थेत आढळतात. इतिहासकारांच्या मते, हे शहर प्राचीन काळात वेवश्वतपूर म्हणून ओळखले जात असे.
चंद्रादित्य मंदिर :-
नागकुळातील राजा चंद्रादित्य याने हे मंदिर बांधले होते आणि राजाच्या नावावरून ते ओळखले जाते. हे शिवमंदिर आहे.
बत्तीसा मंदिर :-
बत्तीस खांबांवर उभे असलेले बत्तीसा मंदिर वाळूच्या दगडापासून बनलेले आहे. हे नागवंशी शासक सोमेश्वर देव यांच्या कारकिर्दीत त्यांची राणी गंगा महादेवी हिने बांधले होते. बत्तीसा मंदिराशिवाय सोळा खांब आणि आठ खांबांची मंदिरेही बांधण्यात आली.
बत्तीसा मंदिर: मंदिरात शिव आणि नंदीच्या मूर्ती आहेत. हे एक हजार वर्ष जुने मंदिर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने दगडांची मांडणी करून बांधण्यात आले आहे.
गणेश मंदिर:
येथे गणेशाच्या दोन विशाल वालुकाश्माच्या मूर्ती आहेत. या मुर्ती कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जगातील एकमेव असे मंदिर जिथे गणपतीच्या दोन महाकाय मूर्ती स्थापित आहेत. एकाची उंची सात फूट तर दुसऱ्याची पाच फूट आहे. या दोन्ही मूर्ती एकाच खडकावर कोणत्याही सांध्याशिवाय तयार केल्या आहेत. पौराणिक मान्यतेनुसार हे मंदिर राजा बाणासुरने बांधले होते. राजाची मुलगी आणि तिची मैत्रिण या दोघांनीही गणेशाची खूप पूजा केली. मात्र या परिसरात गणपतीचे मंदिर नसल्याने राजाने आपल्या मुलीच्या विनंतीवरून हे मंदिर बांधले.
ढोल :-
ढोलकल टेकडी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बैलादिला डोंगररांगेत आहे. हा टेकडी पर्यटन क्षेत्र आहे. ढोलकल टेकडीवर ११व्या शतकातील गणेशमूर्ती विराजमान आहे. साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटने बनवली आहे.
जानेवारी २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी २५०० फूट उंच ढोलकल टेकडीवरून गणेशमूर्ती खाली टाकली होती. त्यामुळे मूर्तीचे १५ तुकडे झाले. जे नंतर सापडले आणि स्थापित झाले.
इतिहास:
ढोलकल शिखर स्थानिक ग्रामस्थांनी शोधून काढले. तज्ज्ञांच्या मते, ढोलकल टेकडीवर गणेश मूर्तीची स्थापना ११ व्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी केली होती. या पुतळ्याभोवती सूर्य आणि शिवाच्या मूर्तीही बसवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या येथे फक्त अवशेष शिल्लक आहेत. या टेकडीवर परशुराम आणि गणेश यांच्यात युद्ध झाले होते, अशी स्थानिक मान्यता आहे. यावेळी गणेशाचा एक दात येथे तुटला, त्यामुळे या गावाचे नाव फरासपाळ पडले.
कपिलेश्वर मंदिर समूह :-
कपिलेश्वर मंदिर समूह छत्तीसगडमधील बालोद शहरातील नयापारा विभागात आहे. हे मंदिर परिसर विविध देवतांना समर्पित सहा मंदिरांचा समूह आहे.या मंदिर समूहामध्ये भगवान शिव, देवी दुर्गा, भगवान गणेश, भगवान कृष्ण, देवी संतोषी आणि राम जानकी यांना समर्पित सहा मंदिरे आहेत. कपिलेश्वर मंदिर समूह बालोद छत्तीसगड - १३ व्या-१४ व्या शतकात नागवंशी राजवटीत बांधले गेले. ही मंदिरे पीडा देवल शैलीत बांधलेली आहेत.
भगवान शंकराला समर्पित कपिलेश्वर मंदिर हे त्यापैकी सर्वात मोठे मंदिर आहे, त्यामुळे या मंदिरांच्या समूहाला कपिलेश्वर मंदिर समूह म्हणतात. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला ६ फुटी गणेशमूर्ती बसवल्या आहेत. मंदिराच्या दरवाजाच्या फांदीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला गंगा, यमुना आणि द्वारपाल यांच्या मूर्ती स्थापित आहेत.
दुसरे मंदिर गणपतीला समर्पित आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीगणेशाची ६ फुटी मूर्ती स्थापित आहे. मंदिराचे शिखर पिडा देवल प्रकारात बांधलेले आहे. छत्तीसगडमध्ये गणेशाच्या अनेक मूर्ती आढळतात, परंतु बहुतेक मूर्ती उघड्यावर किंवा मंदिराच्या मंडपात स्थापित केल्या जातात, परंतु अशी मंदिरे फारच कमी आढळतात.
पिडा मंदीर म्हणजे काय?
मंदिरांचा शिखर पिडा नावाचा उतार, आयताकृती, उंच-निमुळत्या आकाराचा बनलेला आहे, त्यामुळे त्याला पीडा मंदीर असे म्हणतात.
भगवान रामाचे मंदिर गर्भगृह आणि मंडप मध्ये विभागलेले आहे. त्यात रामाची आधुनिक मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यांच्या जुन्या मंदिरांमध्ये भगवान कृष्ण आणि माता दुर्गा यांच्या आधुनिक मूर्ती स्थापित केल्या आहेत. या सर्व मंदिरांमध्ये संतोषी मातेचे मंदिर सर्वात लहान आहे. या मंदिराचे शिखरही पिडा मंदीरच्या आकाराचे आहे.
मंदिरांच्या वरच्या बाजूला सापांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत, ज्यावरून असे सूचित होते की येथेही स्थानिक नागवंशी राजे राज्य करत होते. ही मंदिरे त्याच्या कारकिर्दीत बांधली गेली असे मानले जाते.
माता दंतेश्वरी मंदिरातील गणेश मुर्ती : -
माता दंतेश्वरीच्या मंदिरात, गर्भगृहाच्या अगदी बाहेर, बाहेर पडण्याच्या गेटला लागूनच गणेशाची काळ्या पाषाणातील मूर्ती स्थापित केलेली आहे. दंतेश्वरी मंदिराच्या बांधकामाचे श्रेय चालुक्य शासक अन्नामदेवाला जाते, परंतु मंदिराच्या आत असलेल्या बहुतेक मूर्ती नागा (इ.स. ७६०-१३२४) किंवा नाला ( ई.स. पूर्व ६००-७६० ) काळातील आहेत.
इतर मुर्ती:
कलचुरी काळातील चार हातांची नृत्य गणेशाची मूर्ती मडकू बेटावरील बकुल वृक्षाखाली सापडली आहे. सातव्या शतकातील सुरंग टिळा मंदिरात चार वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंगे असलेली पाच गर्भगृहे आहेत – पांढरी, काळी, लाल आणि पिवळी रंगाची हि शिवलिंगे आहेत, आणि दुसऱ्या गर्भगृहात गणेशाची मूर्ती आहे. भोराम देवाच्या गर्भगृहात पाच तोंडी नागाची मूर्ती, गणेशाची मूर्ती, ध्यानस्थ अवस्थेत एक राजा आणि पूजा करत असलेली स्त्री-पुरुष मूर्ती आहे.
छत्तीसगढ़ मधील प्रसिद्ध प्राचीन शिव मंदिर :-
देवबलोडा येथील शिवमंदिर :-
कलचुरी काळातील (१२ वे ते १३ वे शतक) शिवमंदिर राजधानी रायपूरपासून सुमारे २५ किलोमीटर आणि भिलाईपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात असलेले स्वयंघोषित शिवलिंग तपकिरी रंगाचे आहे. या मंदिराशेजारी तलावासारखी पायरी विहीर आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यातही येथील पाणी आटत नाही. शिवरात्रीच्या निमित्ताने येथे दोन दिवसांची मोठी यात्रा भरते ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.
बोगदा माऊंड मंदिर :-
सुरंग टिळा मंदिर हे छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील सिरपूर शहरात असलेले ७ व्या शतकातील एक प्राचीन शिव मंदिर आहे. या विशाल पश्चिमाभिमुख मंदिरात पाच गर्भगृहे आहेत ज्यात चार वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंगे आहेत – पांढरी, काळी, लाल आणि पिवळी, आणि इतर गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे.
भूतेश्वरदेव महादेव : -
भूतेश्वर महादेवाचे मंदिर छत्तीसगड राज्याच्या गरिआबंद जिल्हा मुख्यालयापासून ३ किलोमीटर अंतरावर, दाट जंगलात मरोडा गावात वसलेले आहे. या शिवलिंगाची उंची १६ फूट असून परिघ २१ फूट आहे. शिवलिंगाची उंची आणि परिघ हळूहळू वाढतो असे भाविकांना वाटते, त्यांच्या मान्यतेनुसार दरवर्षी ६ ते ८ इंचांची वाढ होत आहे.
लक्ष्मणेश्वर महादेव मंदिर :-
हे मंदिर छत्तीसगडच्या जंजगीर जिल्ह्यात वसलेल्या संस्कारधनी शिवरीनारायणापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरौड नगरमध्ये एक शिवमंदिर आहे. हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेले. हे मंदिर ११० फूट लांब आणि ४८ फूट रुंद व्यासपीठावर बांधले आहे. मंदिराच्या गर्भगृहात विशेष शिवलिंगाची स्थापना केली जाते. या शिवलिंगाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एक लाख छिद्रे आहेत, म्हणूनच या शिवलिंगाचे नाव देखील लक्षलिंग आहे. येथे एक लाख दाणे तांदूळ अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
भोरमदेव मंदिर:-
छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील कबीरधामपासून १८ कि.मी. मी दूर आणि रायपूर पासून १२५ किमी. दूर चौरागाव येथे हजार वर्षे जुने मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग स्थापित केले आहे. गर्भगृहात पाच मुखी नागाची मूर्ती, गणेशाची मूर्ती, ध्यानस्थ अवस्थेत एक राजा आणि पूजा करताना स्त्री-पुरुष आहेत.
कुलेश्वर मंदिर : -
हे मंदिर छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील राजीम नगर येथे आहे. हे मंदिर ९ व्या शतकात बांधले गेले. राजीम, पुरातत्वीय, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले ठिकाण, महानदीच्या दक्षिण तीरावर, रायपूरच्या दक्षिणेस ४८ किमी अंतरावर आहे, जिथे पॅरी आणि सोंधुर नद्यांचा महानदीशी संगम होतो. त्याचे प्राचीन नाव 'कमल क्षेत्र' आणि 'पद्मपूर' होते. हे मंदिर संगमाच्या ठिकाणी उंच व्यासपीठावर बांधण्यात आले आहे. या मंदिराला गर्भगृह, अंतराळ आणि मंडप आहे.
पाताळेश्वर/केदारेश्वर महादेव :-
पाताळेश्वर/केदारेश्वर महादेव मंदिर बिलासपूर जिल्ह्यातील मल्हार येथे आहे. बिलासपूर शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेले नगर पंचायत मल्हार हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे मंदिर 10 व्या ते १३ व्या शतकात कलचुरी काळात सोमराज नावाच्या ब्राह्मणाने बांधले होते.
छत्तीसगडमधील राष्ट्रीय संरक्षित मंदिर :-
छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय संरक्षित मंदिरांची एकूण संख्या ३९ आहे, ज्यांची देखभाल केंद्रीय पुरातत्व विभागाकडून केली जाते. या मंदिरांमध्ये सर्वाधिक १७ शिव मंदिरे आहेत. उर्वरित २२ मंदिरे विष्णू, बुद्ध, दंतेश्वरी आणि इतर देवतांची आहेत. ३९ जतन केलेल्या मंदिरांपैकी, विविध देवी-देवतांची अशी १९ ऐतिहासिक मंदिरे आहेत, जिथे आजही नियमितपणे पूजा केली जाते, त्यापैकी आठ मंदिरे भगवान शंकराची आहेत.
आठ राष्ट्रीय संरक्षित पूजा केल्या जाणार्या शिव मंदिरांची यादी :
१) अडभार मंदिर अडभार (उध्वस्त शिवमंदिर)- तालुका- शक्ती, जांजगीर-चांपा (सातवे शतक)
२) महादेव मंदिर पाली - तालुका-पाली, कोरबा (८ वे ते ९ वे शतक)
३ ) पाताळेश्वर महादेव मंदिर मल्हार - तालुका मस्तुरी, बिलासपूर (१२ वे शतक)
४ ) शिव मंदिर गतौरा - तालुका- मस्तुरी, बिलासपूर (१४-१५ वे शतक)
५ ) महादेव मंदिर बेलपण - तालुका- तखतपूर, बिलासपूर (१६ वे शतक)
६ ) महादेव मंदिर बस्तर - तालुका- बस्तर, जगदलपूर (१२ वे शतक)
७ ) महादेव मंदिर नारायणपूर - तालुका- कसडोल, बालोदाबाजार (१३ वे ते १४ वे शतक)
८ ) प्राचीन शिव मंदिर देवबालोडा - तालुका -पाटण, दुर्ग (१४ वे शतक)
बस्तरची शान नारायणपाल विष्णुमंदिर :-
छत्तीसगडचे बस्तर हे नैसर्गिक सौंदर्यासाठी देशभर ओळखले जाते. बस्तर. छत्तीसगढ राज्याचा एक मोठा भाग. केरळ राज्यापेक्षाही आकाराने मोठा असलेला हा भाग. बस्तर म्हटले की आपल्या नजरेसमोर येते तिथले घनदाट जंगल, त्यात राहणारे आदिवासी, तिथले निखळ निसर्गसौंदर्य आणि या साऱ्याला गालबोट लावणारी नृशंस नक्षलवादी हिंसा. पण याच बस्तरमध्ये अनेक सुंदर, प्राचीन मंदिरे आहेत हे किती जणांना ठाऊक आहे? नैसर्गिक सौंदर्यासोबतच बस्तर हे राजेशाही काळात बांधलेल्या मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. बस्तरमधील महादेव, भगवान विष्णू आणि देवी दुर्गा यांच्यावर राजेशाहीच्या काळापासून लोकांची गाढ श्रद्धा असल्याचा पुरावा येथे असलेली प्राचीन मंदिरे आहेत. येथे अनेक भव्य आणि अतिशय सुंदर मंदिरे बांधण्यात आली आहेत. भगवान विष्णूचे मंदिर हे बस्तरच्या भव्य मंदिरांपैकी एक आहे.
)
बस्तर हे १९४७ पूर्वी एक संस्थान होते. बस्तरचे प्राचीन नाव चक्रकोट. इथल्या सध्याच्या राजघराण्याचा मूळ पुरुष आनमदेव हा वारंगलच्या काकतीय राजघराण्यातला धाकटा राजपुत्र मानला जातो. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने चौदाव्या शतकात दक्षिण भारतावर स्वारी केली तेव्हा त्याने वारंगल लुटले व तिथल्या मंदिरांचा विध्वंस केला. तिथला राजा रुद्रप्रताप देव लढाईत मारला गेला पण त्यापूर्वी त्याने आपल्या धाकट्या भावाला, म्हणजे अनामदेवाला त्याचा जीव वाचवण्यासाठी काही विश्वासू सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याच्या सीमेवरच्या जंगलात पाठवले होते. या अनामदेवाने देवी दंतेश्र्वरीच्या कृपेने बस्तर येथे आपली सत्ता प्रस्थापित केली व आपले स्वतंत्र राज्य उभे केले अशी बस्तर भागात श्रद्धा आहे. त्याआधी बस्तरवर नागवंशी राजे राज्य करीत असत. या राजांनी बस्तरमध्ये अनेक मंदिरे बांधली. त्यातली काही प्राचीन मंदिरे हजार वर्षांनंतरही बस्तरमध्ये उभी आहेत. इंद्रावती आणि नारंगी ह्या दोन नद्यांच्या संगमावर बांधलेले नारायणपालचे नऊशे वर्षे जुने विष्णू मंदिर हे त्यातले एक प्रमुख मंदिर.
बस्तरच्या इंद्रावती आणि नारंगी नद्यांच्या संगमाजवळील नारायणपाल गावातील हे जुने विष्णू मंदिर बस्तर आणि छत्तीसगडच्या छिंदक नागवंशी राजांच्या वैभवाचे गौरवशाली स्मारक आहे. इ.स. १०६९ मध्ये, चित्रकुटवर नागवंशी राजा राजभूषण सोमेश्वर देव यांचे राज्य होते. सोमेश्वर देवाचा काळ हा चक्रकोट (बस्तर) चा सुवर्णकाळ होता. सोमेश्वर देवाने आपल्या स्नायूंच्या बळावर चक्रकोटच्या आसपासची राज्ये काबीज केली होती. त्याच्या सन्मानार्थ कुरुष्पालाचा शिलालेख सांगतो की तो दक्षिण कौशलच्या सहा लाख गावांचा स्वामी होता. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. सन १०६९ मध्ये चक्रकोटवर राजा राजभूषण सोमेश्वर देव याचे राज्य होते. सोमेश्वर देव यांचे राज्य म्हणजे चक्रकोटचा सुवर्णकाळ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हे मंदिर बांधायला घेतले. ते पुढे तिच्या मृत्यूनंतर तिचा नातू आणि सोमेश्वर देवाचा पुत्र राजा कन्हारदेव याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याच वेळी, मंदिराच्या जवळ नारायणपूर नावाचे एक गाव देखील स्थापित केले गेले, जे आज नारायणपाल म्हणून ओळखले जाते. हे मंदिर आणि गाव ११११ साली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले होते. हे १००० वर्ष जुने मंदिर जगदलपूरपासून ६० किमी अंतरावर नारायणपाल गावात आहे. या मंदिराला नारायणपाल विष्णू मंदिर म्हणतात.हे मंदिर खरे तर शिवमंदिर होते, परंतु नंतरच्या काळात या मंदिराच्या गर्भगृहात विष्णूची मूर्ती बसवण्यात आली, त्यामुळे या मंदिराला नारायण मंदिर असे संबोधले जाऊ लागले. मंदिराची रचना मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरासारखी आहे.
)
)
)




उंच टेकडीवर वसलेल्या या मंदिराचे शिखर खूप उंच आहे. लाल दगडापासून बनवलेल्या या मंदिराची उंची अंदाजे ७० फूट असेल. हे पूर्वाभिमुख मंदिर सप्तरथ प्रकारचे असून ते एका मोठ्या अधिष्ठाणावर उभे आहे. मंदिराचे विमान सप्तरथ पद्धतीचे आहे, म्हणजे त्याचे उभे सात भाग पाडलेले आहेत. गर्भगृह, अर्धमंडप आणि मंडपामध्ये मंदिर विभागलेले आहे. मंदिराचा मंडप अष्टकोनी आहे.अष्टकोनी सभामंडपाचे छत फंसणा पद्धतीचे आहे. सभामंडपाचे छत आतून लहान लहान होत जाणाऱ्या दगडी वर्तुळांनी सुशोभित केलेले आहे. मंदिराचा दरवाजा अलंकृत वेसर शैलीचा आहे. मंदिराची दुर्दैवाने मंदिराच्या भिंतीवरची सर्व देवकोष्ठे रिकामी आहेत. फक्त एकामध्ये श्री गणेशाची सुंदर उभी मूर्ती आहे.त्याचे भव्य वक्र शिखर हे एक उल्लेखनीय वास्तुशिल्प वैशिष्ट्य आहे. शिखर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा नाजूक नक्षीने नटलेले आहे, वर आमलक आहे.
)

गर्भगृहात चार भुजा असलेली जी श्रीविष्णूची मूर्ती आहे तिच्या हातात सुदर्शन चक्राबरोबरच नागवंशी राजवंशाचे प्रतीक म्हणून एक नागही दाखवलेला आहे, जो या मंदीरावरील आदिवासी प्रभाव दर्शवितो. नागर स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर म्हणजे नागवंशी राजांच्या काळात प्रगत झालेल्या वास्तुकलेचा उत्तम पुरावा आहे. हे मंदिर कित्येक वर्षे भग्नावस्थेत होते. मंदिराचा पुढचा मंडप पाडण्यात आला होता. अशी आख्यायिका आहे की बस्तरच्या एका राजाने पुढे गुप्तधनाच्या लोभात मंदिराचा मंडप पाडला होता. या मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. आज हे मंदिर काही प्रमाणात त्याच्या मूळ स्वरूपात परत उभे राहिले आहे.
)
या मंदिराच्या आत सुमारे ८ फूट उंचीचा शिलालेख आहे, ज्यामध्ये शिवलिंग, सूर्य, चंद्र, गाय आणि वासरू यांचे आकार कोरलेले आहेत. वास्तविक, शिलालेखावर काढलेली आकृती सांगते की मंदिराच्या बांधकामासाठी राजाला कोणत्या लोकांनी मदत केली होती. शिलालेखात लोकेश्वराला जमीन देण्याबाबत चर्चा केली आहे, जे मंदिराचे महत्त्व आणि या प्रदेशाच्या इतिहासाशी असलेले संबंध यावर प्रकाश टाकते.मंदिराच्या शिलालेखांवरील कोरीव कामात कलिंग ( ओरिसा ) शैली स्पष्टपणे दिसते.
मंदिरात बसवलेल्या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की हजार वर्षांपूर्वीही बस्तरचे रहिवासी मंदिराच्या बांधकामात राजांना पैसे देऊन मदत करत होते. मंदिराच्या उभारणीत मदत करणाऱ्यांची नावे नोंदवली आहेत. शिलालेखानुसार हे मंदिर नागवंशी राजा जगदेव भूषण याच्या विष्णू भक्त राणीने म्हणजे गुंडमहादेवीने तिच्या वयाच्या शंभराव्या वर्षी तिचा शूर पुत्र राजा सोमेश्वर देव याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ बांधायला घेतले.
चित्रकूट, बस्तरच्या तीरथगड धबधब्याला भेट दिल्यानंतर, पर्यटक नारायणपाल मंदिरात भगवान विष्णूंच्या येतात. नारायणपाल विष्णू मंदिर हे बस्तरचा अमूल्य ऐतिहासिक वारसा आहे. नारायणपाल विष्णू मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे प्राचीन मंदिरे, स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५८ च्या अंतर्गत संरक्षित आहे. लोक म्हणतात की नारायणपाल मंदिर हे बस्तर जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे जिथे भगवान विष्णूची मूर्ती स्थापित आहे.
नारायणपालच्या शेजारील कुरुषपाल गावातील ग्रामीण बुटूरामच्या शेतात भगवान आदिनाथांची हजारो वर्ष जुनी मूर्ती सापडली आहे. सोनारपालच्या जैन भाविकांच्या मदतीने गावकऱ्यानी आदिनाथांचे मंदिर बांधले आहे. नारायणपालजवळ तीर्थ नावाचे गाव आहे. नारायणपालपासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या पूर्व टेमराच्या जंगलात अकराव्या शतकातील गजलक्ष्मीसह तेरा मूर्ती दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. त्याचप्रमाणे दुर्मिळ लज्जागौरीसह अनेक दुर्मिळ मूर्ती बोद्रागड किल्ल्यात दुर्लक्षित अवस्थेत आहेत. पुरातत्व विभागाला याची माहिती असली तरी सध्या त्यांच्याकडे संवर्धनाचा कोणताही प्रकल्प नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्व विभाग या मूर्तींच्या संरक्षणासाठी काहीही करत नाही. मुळात बस्तरला फार कमी पर्यटक भेट देतात, त्यातही या मंदिरात त्याहूनही कमी लोक जातात, त्यामुळे इथला परिसर अत्यंत स्वच्छ, रमणीय आणि शांत आहे. लोकांच्या वर्दळीपासून दूर असलेले हे हजार वर्षे जुने मंदिर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आजकाल जगदलपूरला विमानतळ झाल्यामुळे या मंदिराला आणि बस्तरला भेट देणे पूर्वी होते तितके कठीण राहिलेले नाही. मुद्दाम भेट द्यावे असे हे आगळे वेगळे विष्णू मंदिर म्हणजे बस्तरची शान आहे.
लाल विटांचं सिरपूरचं लक्ष्मणमंदिर :-
छत्तीसगड म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती तिथली आदिवासी संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगले. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की भारतातले सर्वांत जुने विटांनी घडलेले मंदिर छत्तीसगड राज्यात सिरपूर येथे आहे? रायपूर जवळील महासमुंद जिल्ह्यात महानदीच्या तीरावर सिरपूर हे आजचे छोटे गांव प्राचीन काळी श्रीपूर म्हणून ओळखले जात असे. महाकोसल राज्याची वैभवसंपन्न राजधानी होती श्रीपूर. श्रीपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आजही तिथल्या प्राचीन इतिहासाच्या खुणा पदोपदी सापडतात. यातील एक प्रमुख ठिकाण म्हणजे सिरपूरचे लक्ष्मण मंदिर.
हे मंदिर देशात सापडलेले सर्वांत जुने लाल विटांनी बांधलेले मंदिर आहे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दीड हजार वर्षांहूनही जास्त जुने असलेले हे मंदिर भूकंप, पूर, विध्वंसक इस्लामी आक्रमणे आदी अनेक विनाशकारी आपत्तींना तोंड देऊनही भक्कम उभे आहे.
सिरपूर हे छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील महानदीच्या काठी स्थित एक पुरातत्व स्थळ आहे. या ठिकाणाचे प्राचीन नाव श्रीपूर आहे. हे एक मोठे शहर होते आणि दक्षिण कौशलची राजधानी होती.



प्रख्यात कला इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार सिरपूरचे लक्ष्मण मंदिर इसवीसन ५२५ ते ५४० च्या दरम्यान बांधले गेले. श्रीपूर येथे एकेकाळी महाकोसलवर राज्य करणाऱ्या सोमवंशी राजांचे राज्य होते. हे राजे शैव होते. या शैव राजांपैकी एक राजा होता सोमवंशी हर्षगुप्त. पण त्याची पत्नी राणी वस्तादेवी ही मगध राजा सूर्यवर्मा यांची मुलगी परम विष्णुभक्त होती. राजा हर्षगुप्ताच्या मृत्यूनंतर राणीने आपल्या पतीच्या आठवणीसाठी हे मंदिर बांधले.मंदिर बांधण्यासाठी आजूबाजूच्या सर्व कारागिरांना आणि कारागिरांना बोलावणे मानले. त्यानंतर राजीममध्ये विटांचे मंदिर बांधणाऱ्या वृद्ध कारागिराला पाचारण करण्यात आले आणि राणी वस्तादेवीच्या सूचनेनुसार लक्ष्मण मंदिर विटांनी बांधण्यात आले. राणी वसता देवी देखील एक कारागीर होती, जी कारागिरी आणि कोरीव कामात निपुण होती. हे मंदिर बांधायला दोन पिढ्या लागल्या कारण त्याची सुरुवात राणी वसता देवीने केली होती पण संपूर्ण बांधकाम महाशिवगुप्त बालर्जुन यांनी पूर्ण केले होते. महाशिवगुप्त बालार्जुन (इ.स. ५९५-६५५) याच्या ५८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत येथे अनेक शिव आणि विष्णू मंदिरे, तलाव आणि उद्याने बांधली गेली. हे शैव धर्माचे उपासक होते, परंतु त्यांनी इतर धर्मांवर कधीही बहिष्कार टाकला नाही, उलट त्यांनी इतर धर्मांचे स्वागत केले, म्हणूनच त्यांच्या काळात बौद्ध धर्म प्रचलित होता शैव, वैष्णव आणि जैन धर्म आजही पहायला मिळतात - त्यांच्या राजवटीत २२ शिवमंदिरे, १० बौद्ध विहार, ४ विष्णू मंदिरे, ३ जैन विहार बांधले गेले. इसवी सनाच्या सातव्या शतकात, महान चीनी पर्यटक आणि विद्वान ह्युएन त्सांगने ६३९ मध्ये दक्षिण कोसलला भेट दिली. महाशिवगुप्त बालार्जुननंतर सिरपूरचे राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले आणि दक्षिण कोसलाच्या इतिहासातील सुवर्णकाळ संपुष्टात आला.
इथे एक गोष्ट महत्वाची आहे कि पती निधनानंतर राणि वस्तादेवी सती गेली नाही की विधवा म्हणून रडतही बसली नाही. आपल्या मुलाच्या नावाने तिने काही वर्षे राज्यकारभार चालवला आणि हे भव्य, सुंदर मंदिर बांधवून घेतले. तेही दीड हजार वर्षांपूर्वी. हिंदू स्त्रीला पती निधनानंतर समाजात काहीच अधिकार नव्हते म्हणणाऱ्या लोकांना दुर्दैवाने अशा गोष्टी दिसत नाहीत!

उत्तरभारतात प्रचलित असलेल्या नागर शैलीत बांधलेले हे मंदिर भारतातील पहिले लाल विटांनी बांधलेले मंदिर मानले जाते. लक्ष्मण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात विटांवर कोरून नाजूक कलाकृती बनवल्या गेल्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. सामान्यतः अशी सुंदर कोरीवकामे दगडावरच केली जातात कारण दगड हे एक कठीण आणि टिकाऊ असे माध्यम असते. भाजलेली वीट मऊ आणि ठिसूळ असते. कोरीव काम करताना सहज तुटू शकते. पण सिरपूरच्या लक्ष्मण मंदिरावरचे कोरीव काम अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे.

सामान्यतः नागर मंदिरात असतात तसे गर्भगृह, अंतराळ आणि सभा मंडप हे लक्ष्मण मंदिराच्या रचनेचे मुख्य भाग होते. दुर्दैवाने आता सभामंडप उध्वस्त झालेला आहे. अंतराळ आणि गर्भगृह शाबूत आहेत. विशेष म्हणजे मंदिर लाल विटांचे असले तरी खालचा चौथरा हा वोल्कॅनिक बॅसाल्ट म्हणजे जांभ्या दगडात उभारलेला आहे. हा दगड ह्या भागात मिळत नाही. तो ओडिशातून महानदी मार्गे गलबतांमधून आणला गेला असावा असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे.
या मंदिराच्या गर्भगृहाची पूर्ण दगडी द्वारशाखा हे ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. द्वारशाखेवरच्या ललाटपट्टावर शेषशायी भगवान विष्णुची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. ब्रह्मा मूर्तीच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान आहे. देवी लक्ष्मी भगवान विष्णुच्या चरणी बसलेली आहे. या ललाटपट्टावरून असे वाटते की आज जरी या मंदिराला लक्ष्मण मंदिर म्हणून ओळखत असले तरी हे एकेकाळी श्रीविष्णुचे मंदिर असावे. येथे उत्खननात सापडलेली श्रीविष्णुची एक भग्नावस्थेतीतली एक अत्यंत सुंदर मूर्ती शेजारच्याच म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ती मूर्ती एकेकाळी या गर्भगृहात असली पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. द्वारशाखेवर एका बाजूला भगवान विष्णुचे दशावतार चित्रित केले गेले आहेत. सध्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती आहे ती लक्ष्मणाची मानली जाते. ही मूर्ती पाच मस्तके असलेल्या शेषनागावर विराजमान आहे.
सिरपूरचे लक्ष्मण मंदिर पारौली आणि भितरगावच्या गुप्त मंदिरांच्या परंपरेतील मानले जाते. १९५४ आणि १९७७ च्या उत्खननात, नंतरच्या गुप्त काळातील मंदिरांचे अवशेषही सिरपूर येथे सापडले आहेत. सिरपूरचे वर्णन करणारा उल्लेख ताम्रपट्ट जवळच्याच राजीम येथे उत्खननात सापडला आहे.

प्रेमाचे प्रतीक म्हणून आग्राच्या ताजमहालबद्दल अनेकदा आपल्याला सांगण्यात आले होते, परंतु स्त्री आणि पुरुष यांच्यातील खऱ्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या सिरपूरचे लक्ष्मण मंदिर हे मंदिर आपल्याला माहिती नसते. एका राणीचे आपल्या राजाबद्दलचे प्रेम इतके प्रखर होते की तिने एक मंदिर बांधले जे अनेक संकटांना तोंड देत आजही १५०० वर्षांपूर्वी जसे होते तसेच आजही आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, पुढे बाराव्या शतकात सिरपूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने तत्कालीन श्रीपूरचे संपूर्ण वैभव हिरावून घेतले. या भूकंपात संपूर्ण श्रीपूर नष्ट झाले पण हे लक्ष्मण मंदिर होते तसेच राहिले. पण त्यानंतर तेराव्या शतकाच्या दरम्यान, महानदीच्या भयंकर पूराने सिरपूरमध्ये हाहाकार केला.या भूकंपात संपूर्ण श्रीपूर उद्ध्वस्त झाले पण हे लक्ष्मण मंदिर अबाधित राहिले.
पुढे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर वारंगलच्या काकतीय राज्याच्या हद्दीत वसले होते. पण १३१० मध्ये, जेव्हा अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने आपल्या सैन्यासह दक्षिणेवर स्वारी करून तिथल्या देवस्थानांचा विध्वंस केला तेव्हा सिरपूरवरही हल्ला करून तिथली मंदिरे आणि बौद्धविहार त्याने उध्वस्त केले असे अमीर खुसराऊ याने आपल्या बखरीत नमूद केले आहे. या सर्व विनाशकारी आपत्तींमुळे सिरपूरची अनेक मंदिरे आणि देवस्थाने तोडली गेली आणि पुढे अनेकदा महानदीला आलेल्या पुरात त्यांचे अवशेष मातीत बुडून गेले, आणि सिरपूर हळूहळू लोकांच्या विस्मृतीत गेले.


१९७७ मध्ये झालेल्या उत्खननात छत्तीसगडचे नावाजलेले पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण कुमार शर्मा ह्यांनी इथली बरीच नवी मंदिरे शोधून काढली. याशिवाय उत्खननातून मिळालेल्या नटराज, उमा-महेश्वर, वराह, विष्णू, वामन, महिषासुरमर्दिनी, नदी देवी इत्यादी कलात्मक शिल्पे प्रत्येक मंदिरात जतन करण्यात आली आहेत.

भगवान शिवाच्या भैरव अवताराची एक दुर्मिळ मूर्ती देखील उत्खनन करताना सापडली आहे जी संग्रहालयात सुरक्षित आहे.
महिषासुर मर्दिनी आदिशक्तीची अतिशय कलात्मक शिल्पेही येथे ठेवली आहेत.
शृंगार रसाच्या सुंदर मूर्तीही आनंदमुद्रामध्ये आहेत.
येथे वीर रसाच्या मूर्तीही आहेत ज्यात स्त्री-पुरुष कुस्ती खेळताना दाखवले आहेत. त्याच्याकडे सुंदर शस्त्रेही आहेत.
भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराच्या एका विशेष रूपात सापडले आहे.
एवढेच नाही तर भगवान शंकराच्या शिवलिंगाच्या रूपात अनेक प्रकारची लिंगे संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय सिंहाशी खेळणाऱ्या माणसाची मूर्ती आणि गणेश आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीही आहेत.

आज सिरपूर मध्ये पाहण्यासारखे खूप आहे. पूर्ण दिवस इथली विविध मंदिरे, बौद्ध विहार आणि इतर पुरातन अवशेष बघताना कसा जातो तेच कळत नाही.सिरपूरचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन छत्तीसगड सरकारतर्फे दरवर्षी येथे सिरपूर महोत्सवाचे आयोजन केले जाते.सिरपूर हे लोकांच्या श्रद्धा आणि श्रद्धेचे केंद्र आहे, जे पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात.
सिरपूरच्या लक्ष्मण मंदिरात मात्र मुर्तीची पूजा होत नाही. मंदिरांशी सरकारला काही देणेघेणे नाही, हे वास्तव आहे. या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. इथे सुविधा नाहीत. पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे मात्र उत्तम दर्जाचे खाणे मिळत नाही.तुमची गाडी बिघडली तर मेकॅनिक उपलब्ध असेल, याची खात्री नाही. कुठेही सुलभ शौचालये दिसत नाहीत.
स्थानिक लोक हळूहळू जंगल तोडत आहेत. जे मंदिर जंगलाच्या मधोमध होते, ते आता स्थानिक लोक आणि सरकारच्या मेहरबानीमुळे मंदिरापासून १५ किलोमीटर दूर गेले आहे. महानदीही हळूहळू संकुचित होऊन दूर जात आहे. या परिसरात हत्ती असल्याचे फलक लावले आहेत, मात्र पर्यटकांच्या समोर हत्ती आले तर मदत करण्यासाठी तेथे कोणीही वनरक्षक नाही. एकूणच येथील व्यवस्था देवाच्या भरवशावर चालत आहे. आपला विश्वास बसत नाही की हे तेच सिरपूर आहे जे एकेकाळी दक्षिण कौशलची म्हणजेच छत्तीसगडची राजधानी होती. आता ते फक्त ग्रामपंचायत आहे. एकंदरीत छत्तीसगडमधील पर्यटन शेवटचे श्वास घेत आहे, सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर काही करता येईल. सर्वप्रथम जवळ असलेला सरकारी दारूचे दुकान हटवायला हवे. वृक्षारोपण करून स्थानिकांना जागरूक केले पाहिजे. सर्व पर्यटन स्थळांकडे नेणार्या, टूर देणाऱ्या सरकारी बसेस चालवायला हव्यात आणि या परिसराचा इतिहास सांगू शकतील असे टूर गाईडही नेमावेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सुलभ शौचालये बांधली पाहिजेत. वनरक्षकाचीही नियुक्ती करावी. जंगल आणि गाव यांच्यात एकोपा असेल तरच या परिसराची भव्यता परत येईल.
कसे पोहोचायचे? सिरपूर येथील लक्ष्मण मंदिरापासून महासमुंद जिल्हा मुख्यालयाचे अंतर सुमारे ३८ किलोमीटर (किमी) आहे. येथील सर्वात जवळचे विमानतळ रायपूर येथे आहे, जे मंदिरापासून ७५ किमी अंतरावर आहे. महासमुंद रेल्वे स्टेशन हे मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे, सुमारे ४० किमी अंतरावर आहे. रायपूर जंक्शनपासून मंदिराचे अंतर अंदाजे ८३ किमी आहे.राज्य महामार्ग ९ वर हे लक्ष्मण मंदिर आहे, या महामार्गाने राज्यातील विविध शहरांतून सिरपुरला जाता येते.
गंधेवर महादेव मंदिर :-
सिरपूरमधील दुसरे मंदिर गंडेश्वर
महादेवाचे आहे. हे महानदीच्या काठी वसलेले आहे. त्याच्या दोन खांबांवर
शिलालेख कोरलेले आहेत. चिमणाजी भोंसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार
केल्याचे सांगितले जाते. सिरपूर येथून बौद्ध काळातील अनेक मूर्ती सापडल्या
आहेत, त्यापैकी ताराची मूर्ती सर्वात सुंदर आहे. तेवरदेवाच्या राजीम-तामरा
प्लेट शिलालेखात सिरपूरचा उल्लेख आहे. १४ व्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर
वारंगलच्या काकतिया राजांच्या राज्याच्या सीमेवर वसले होते. इ.स. १३१०
मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने वारंगलकडे कूच करताना
सिरपूरवरही हल्ला केला, ज्याचा वृत्तांत अमीर खुसरोने लिहिला आहे.

गंधेश्वर महादेव के नाम से पूजे जाते हैं शम्भू
सिरपूर हे छत्तीसगड राज्यातील भगवान शिवाचे वस्तीस्थान असलेले शहर मानले
जाते. सोमवार असो किंवा श्रावण महिना, शंकराच्या दर्शनासाठी येथे
भाविकांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी जत्रा
भरते. इथे असलेल्या भगवान शंकराच्या मंदीराला गंधेश्वर महादेव म्हणून ओळखले
जाते. महानदीच्या पवित्र तीरावर गंधेश्वराच्या रूपात भगवान शंकराची येथे
पूजा केली जाते. नदीच्या काठाला लागून असलेले हे मंदिर बाणासुरने आठव्या
शतकात बालर्जुनच्या काळात बांधले होते.

याविषयी एक पुराण कथा आहे की बाणासुर नेहमी शिवपूजेसाठी काशीला जात असत
आणि तेथे शिवलिंगची पुजा करत असे. एके दिवशी भगवान शंकर प्रकट झाले आणि
बाणासुरला म्हणाले की तू नेहमी पूजा करण्यासाठी काशीला येतो, आता मी
सिरपूरमध्येच प्रकट होत आहे. यावर बाणासूर म्हणाले की, भगवंत, मी
सिरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली आहे. भोलनाथ
प्रगट झालेले शिवलिंग नेमके कसे ओळखायचे असे त्याने विचारले. त्यावर शंभू
महादेव म्हणाले, ज्या शिवलिंगाचा वास येतो त्याच शिवलिंगाची प्रतिष्ठापना
करून पूजा कर. तेव्हापासून सिरपूरमध्ये भगवान शंकराची गंधेश्वर महादेव
म्हणून पूजा केली जाते.
मुख्य प्रवेशद्वार



गंधेश्वर महादेवाच्या शिवलिंगातून कधी पवित्र तुळशीसारखा सुगंध येतो तर
कधी चंदनाच्या लाकडाचा वासही जाणवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पूर्वी हा
सुगंध आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणात जाणवत होता. कालांतराने आणि
शिवलिंगाच्या नैसर्गिक झीज झाल्यानंतर त्यात थोडीशी घट झाली आहे, पण आता
हाताला स्पर्श केला तरी सुगंध येतो, असे भाविक सांगतात. असे मानले जाते की
आजही गर्भगृहातील शिवलिंगातून कधी सुगंध तर कधी दुर्गंधी येते, म्हणूनच
येथे गंधेश्वराच्या रूपात शिवाची पूजा केली जाते. गंधेश्वर मंदिर हे खूप
जुने मंदिर आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण
महिन्यात इथे खुप जास्त गर्दी असते. खरं तर श्रावणाच्या आधी पावसाचे आगमना
होउन निसर्ग जेव्हा वरून पाण्याचा वर्षाव करतो, तेव्हा त्या काळात भगवान
शंकराला जल अर्पण केल्याने तुम्ही निसर्गाशी एकरूप होता, त्यामुळेच
श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे, असे म्हणतात.
गंधेश्वर महादेव मंदिरात जल अर्पण करून मनापासून जी इच्छा केली जाते ती
नक्कीच पूर्ण होते, असा भाविकांना विश्वास आहे.
जर तुम्हालाही
गंधेश्वर महादेव मंदिराला भेट द्यायची असेल, तर रायपूरपासून रस्त्याने
सिरपूर ८५ किमी आहे आणि महासमुंदपासून ४० किमी अंतरावर आहे. इथे बस, कार
किंवा कॅबने सहज पोहोचता येते.
शिवरीनारायण मंदिर
छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यातील महानदी, शिवनाथ आणि जोंक नद्यांच्या संगमावर वसलेले शिवनारायण हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम या देशातील चार प्रमुख धामांनंतर याला पाचवे धाम म्हटले जाते यावरून या ठिकाणाचे महत्त्व लक्षात येते. हे शहर सत्ययुगात बैकुंठपूर, त्रेतायुगात रामपूर, द्वापारयुगात विष्णुपुरी आणि नारायणपूर या नावांनी प्रसिद्ध होते,हे ठिकाण भगवान जगन्नाथाचे मूळ स्थान आहे आणि म्हणून छत्तीसगडची जगन्नाथपुरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रभू रामाचे नारायणी रूप गुप्तपणे वास्तव्य करते. म्हणून याला गुप्त तीर्थधाम किंवा गुप्त प्रयागराज असेही म्हणतात. दरवर्षी माघ महिन्यात इथं मोठी जत्रा भरते आणि पार ओडिशापासून हजारो भाविक हिंदू येथे श्री नारायणाचे दर्शन घ्यायला येतात. स्कंद पुराणात ह्या क्षेत्राला श्री पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटलेले आहे. विटांनी बांधून वर शुभ्र चुन्याचा लेप दिलेले इथले शिवरीनारायण मंदिर निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसते.
शिवरीनारायण मंदिर

शिवनारायण हि धार्मिक नगरी असून इथे देशातील अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथील नर नारायणाचे मंदिर बडा मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरासमोर माता शबरीचे प्राचीन मंदिर आहे, जिथे लोक श्रद्धेने येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शन घेतात.

शबरी आणि नारायण यांच्या अतूट प्रेमामुळे या स्थानाला शिवरीनारायण असे नाव पडले. आजही आई शबरीचे रामावरील प्रेम लक्षात ठेवून लोक सीता राम म्हणत एकमेकांना नमस्कार करतात. त्रिवेणी संगमावर एकेकाळी मातंग ऋषींचा आश्रम होता असे मानले जाते. भक्त माता शबरी त्यांची शिष्या. ती या प्रदेशाचा आदिवासी राजा शबर ह्याची मुलगी होती आणि लहानपणापासूनच विष्णू भक्त होती. राजा शबरला शबरीचे लग्न करायचे होते. पण शबरीला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे एके दिवशी ती घर सोडून देवाच्या शोधात जंगलाकडे निघते. त्या दिवशी ती पंपा नावाच्या तलावात पोहोचते. जिथे तिला एक आश्रम दिसला तो आश्रम मातंग मुनींचा आश्रम होता. मातंग ऋषींचा आश्रय घेतो. ऋषी, आपल्या दिव्य दृष्टीने, साबरीला विष्णूची भक्त मानून, तिला आपल्या आश्रमात आश्रय देतात. ऋषींनी शबरीला आपले शिष्य बनवले आणि शिक्षण देऊ लागले. आणि भक्तिमार्गाचा मार्ग मोकळा केला. मातंग ऋषींच्या गुरुकुलाची कीर्ती दूरवर पसरली होती.
प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासाच्या काळात चित्रकूट येथे वास्तव्यास होते. त्याचवेळी मातंग ऋषींनी देह सोडला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आश्रमाची सर्व जबाबदारी शबरीवर सोपवली, कारण शबरी अत्यंत तल्लख, ज्ञानी आणि वैष्णव भक्तीचा मार्ग अवलंबणारी आचार्य होती.त्यामुळे एके दिवशी ती घर सोडून देवाच्या शोधात जंगलाकडे निघते. त्या दिवशी ती पंपा नावाच्या तलावात पोहोचते. जिथे तिला एक आश्रम दिसला तो आश्रम मातंग मुनींचा आश्रम होता. मातंग ऋषींचा आश्रय घेतो. ऋषी, आपल्या दिव्य दृष्टीने, साबरीला विष्णूची भक्त मानून, तिला आपल्या आश्रमात आश्रय देतात. ऋषींनी शबरीला आपले शिष्य बनवले आणि शिक्षण देऊ लागले. आणि भक्तिमार्गाचा मार्ग मोकळा केला. मातंग ऋषींच्या गुरुकुलाची कीर्ती दूरवर पसरली होती. प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासाच्या काळात चित्रकूट येथे वास्तव्यास होते. त्याचवेळी मातंग ऋषींनी देह सोडला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आश्रमाची सर्व जबाबदारी शबरीवर सोपवली, कारण शबरी अत्यंत तल्लख, ज्ञानी आणि वैष्णव भक्तीचा मार्ग अवलंबणारी आचार्य होती.आपला देह ठेवताना मातंग ऋषीनी शबरीला सांगितले की श्री विष्णूंचा अवतार श्रीराम अयोध्येत जन्मणार आहे आणि तो एक दिवस या आश्रमात येईल. त्या आशेवर शबरी आपले जीवन कंठीत राहिली. वर्षे उलटत गेली. इतर शिष्य आश्रम सोडून गेले. शबरी वृद्ध झाली पण कधीतरी श्रीरामांचे सावळे चरण आपल्या आश्रमाला लागतील ह्या आशेवर शबरी तिथे एकटीच राहिली. शेवटी भगवान राम, माता सीतेच्या शोधात जंगलातून भटकत असताना माता शबरीच्या कुटीत आले. भुकेल्या रामलक्ष्मणांना शबरीनें वडाच्या पानांच्या द्रोणातून बोरं खायला दिली, पण बोरात कीड असेल ह्या भीतीने प्रत्येक बोर चाखून तिने चांगली तीच बोरे श्रीरामाला दिली आणि भक्तीने ओथंबलेली शबरीची उष्टी बोरे खाऊन श्रीराम तृप्त झाले ही रामायणातील कथा आपण सर्वांनीच ऐकलेली आहे.

तो प्रसंग जिथे घडला ते हे ठिकाण. अगदी आजही मंदिराच्या बाहेर वडाचे एक असे झाड आहे ज्याची पाने निसर्गतःच द्रोणासारखी आहेत! लोक मोठ्या आदराने या झाडाची पूजा करतात आणि त्याची पाने प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. या झाडाला कृष्णवट आणि माखन कटोरी वृक्ष असेही संबोधले जाते.
भगवान रामाच्या पादुका
आज शिवरीनारायणाचे जे मंदिर आपल्याला दिसते ते अनेक जीर्णोध्दार झाल्यानंतरचे स्वरूप आहे. १७२ फूट उंचीचे नागर पद्धतीचे शिखर असलेले हे मंदिर कलचुरी कालीन स्थापत्य कलेचा नमुना मानले जाते. मंदिराच्या सभामंडपात डाव्या हाताला आठव्या शतकातील गरुडारूढ लक्ष्मी-नारायणाची काळ्या पाषाणातली एक अत्यंत सुंदर, भव्य मूर्ती भिंतीत बसवलेली आहे. गरुडाच्या चेहेऱ्यावरचा कृतार्थ भक्तीचा भाव साकारण्यात शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. मंदिराच्या गर्भगृहाबाहेरची द्वारशाखा म्हणजे कलचुरी कालीन मंदिर स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. द्वारशाखेवर नागमंडळे कोरलेली आहेत तसेच गंगा-यमुना आणि श्री विष्णूचे आयुधपुरुष म्हणजे शंख पुरुष व चक्र पुरुष ह्यांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. गर्भगृहात दोन मूर्ती आहेत, काही लोक ह्या मूर्ती राम आणि लक्ष्मण ह्यांच्या आहेत असे मानतात तर काही लोक नर आणि नारायण यांच्या. मूर्तीच्या पायाखाली निर्मळ, गोड पाण्याचे एक कुंड आहे जे अक्षय्य आहे. त्याला रोहिणी कुंड असे नाव आहे. ज्याचे पाणी कधीही कमी होत नाही. भगवान नर नारायणाच्या चरणांवर नेहमी पाण्याचा अभिषेक होतो.
शिवरीनारायण मंदिर आणि ओडिशामधल्या जगन्नाथपुरीचे जगन्नाथ मंदिर
ह्यांचा खूप जवळचा संबंध मानला जातो. असे म्हणतात की नीलमाधव हा मूळचा
इथल्या शबरांचा देव. पुढे त्याची स्थापना पुरीमध्ये केली गेली. चौदाव्या
शतकातील ओडिया कवी श्री सरलादास यांनी आपल्या जगन्नाथावरच्या काव्यात असा
उल्लेख केलेला आहे की श्री जगन्नाथाची मूर्ती शबरीनारायण इथून महानदीमार्गे
ओडिशा इथे नेण्यात आली. आजही बरेच भाविक असे मानतात की रथयात्रेच्या काळात
जेव्हा पुरीचे जगन्नाथ मंदिर दर्शनासाठी बंद असते तेव्हा त्यांचा निवास
शिवरीनारायण येथे गुप्त स्वरूपात असतो.दरवर्षी माघी पौर्णिमेपासून
शिवनारायणात १५ दिवसांची यात्रा भरते. माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान
जगन्नाथ आपल्या जन्मगावी येतात, त्यामुळे लाखो भाविक भगवान नर नारायणाच्या
दर्शनासाठी येतात. लोकांची गर्दी आणि उत्साह लक्षात घेऊन छत्तीसगड सरकार 3
दिवस शबरी महोत्सवाचे आयोजन करते. याशिवाय महानदीच्या घाटांच्या
सुशोभिकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. राम वनपथ गमनाच्या पहिल्या
टप्प्यात त्याचा समावेश करून सरकार शिवनारायणाला पर्यटन क्षेत्रात
प्रोत्साहन देत आहे. पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
कसे पोहोचायचे:-
राजधानी रायपूरपासून त्याचे अंतर १७८ किमी आहे. आणि बिलासपूरपासून त्याचे अंतर ६० किलोमीटर आहे. रस्ते पक्के झाले आहेत. जवळच्या शहरांतून मोटार बसेसही येतात. शबरी नारायण येथे राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत. आणि मंदिर समितीच्या वतीने दररोज मोफत भंडारा आयोजित केला जातो, शबरीनारायणापासून काही अंतरावर हनुमानजींचे मंदिर आहे. त्या ठिकाणाला जनकपूर म्हणतात. नदीच्या पलीकडे एक वटवृक्ष आहे जो विश्राम वट (विधौरी) म्हणून ओळखला जातो. या झाडाखाली भगवंतांच्या चरणी पादुका ठेवण्यात आल्या आहेत. प्रभू रामांनी येथे विश्रांती घेतली आणि नंतर या आश्रमात प्रवेश केला असे मानले जाते.
शिवनारायणाची मुख्य मंदिरे खालीलप्रमाणे आहेत.
केशव नारायणाचे मंदिर :-
मुख्य मंदिराच्या परिसरातच केशव नारायणाचे छोटे मंदिर आहे हे मंदिर नर-नारायण मंदिरासमोर आहे. त्याला शबरी-दै मंदिर असेही म्हणतात. मंदिराची मूळ रचना अंशतः शाबूत आहे, त्याचे छत आणि मंडप टिकले नाही, सध्या फक्त गर्भगृह आणि अंतराळ शिल्लक आहे. त्यामुळेच याला अपूर्ण मंदिर म्हटले जाते, हे मंदीर मुळात एका रात्रीत पूर्ण बांधले जाणार होते, परंतु ते प्रत्यक्षात होउ शकले नाही आणि पहाटेच शिल्पकार निघून गेले. हे मंदिर विष्णूचे असावे, कारण ललाट-बिंबावर विष्णु मुर्ती दिसते. काहींच्या मते ती विश्वकर्माची प्रतिमा आहे, तर काहींच्या मते ती विष्णूची प्रतिमा आहे.तसेच ब्रह्म आणि शिव मुर्ती देखील दिसतात.

या मंदीराची द्वारशाखाही आठव्या-नवव्या शतकातली असून अत्यंत देखणी आहे. द्वारशाखेवर श्रीविष्णूंच्या चोवीस अवस्थिती जसे केशव , माधव, नारायण इत्यादी कोरलेले आहेत. आकाराने छोट्या पण अत्यंत सुरेख अशा गंगा यमुनाही द्वारशाखेवर आहेत. ललाटबिंबावर मात्र शिव आहेत. जवळच कलचुरी कालीन शिलालेख आहे. काळाच्या ओघात अनेकदा जीर्णोद्धार झाल्यामुळे मुख्य मंदिर आता बऱ्यापैकी आधुनिक झाले आहे, पण इथल्या आठव्या शतकातल्या द्वारशाखा आणि लक्ष्मी नारायणाची सुंदर गरूढारूढ मूर्ती मुद्दाम जाऊन बघण्यासारखी आहे.
गर्भगृहाच्या आत केशव-नारायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णूची प्रतिमा आहे. त्याला चार हात दाखवले आहेत, मात्र सध्या फक्त एक हात बाकी आहे ज्यामध्ये त्याने चक्र धारण केले आहे. या मुर्तीभोवती विष्णूचे दहा अवतार चित्रित केले आहेत. त्याच्या उजव्या पायाजवळ ठेवलेली छोटीशी प्मुर्ती शबरी म्हणून ओळखली जाते. तथापि, अंजली-मुद्रामध्ये दोन्ही हात धरून ठेवलेल्या पुरुषाची ती मुर्ती असावी. हि मुर्ती दाता किंवा भक्ताची असू शकतो.
चंद्रचूड़ मंदिर :
-
श्री नर नारायण मंदिराजवळ भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला चंद्रचूड महादेव म्हणतात. या मंदिरात अनेक मूर्ती आहेत. यासोबतच कलचुरी काळातील शिलालेखही सापडले आहेत. मंदिराच्या प्रांगणात परमेश्वराच्या पावलांचे ठसे आहेत. आणि एक प्राचीन विहीर आहे. काही मंदिरे देखभालीअभावी मोडकळीस येत आहेत. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिक्रमणाचा बळी ठरला आहे.
भगवान नर नारायण शिवरीनारायण
नर नारायण मंदिर शिवरीनारायण मंदीर :-
हे मंदीर १२ व्या शतकाच्या आसपास बांधलेले हे प्राचीन मंदिर शबर राजाने बांधले होते. या मंदिरात एक तलाव आहे. ज्याला रोहणी कुंड म्हणतात, जो जमिनीच्या वर आहे. जे सदैव पाण्याने भरलेले असते आणि त्याने भगवान रामाचे चरण कमल धुतले जातात, या पाण्याला अक्षय जल म्हणतात. भगवंताच्या या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतल्यानेच मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. मंदिर खूप भव्य आहे. मंदिराचे शिखर बऱ्यापैकी उंच आहे. मंदिराच्या आत उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या मंडपाच्या डाव्या बाजूला भगवान लक्ष्मीनारायण यांची प्राचीन मूर्ती ठेवण्यात आली होती जी उत्खननात सापडली होती. मूर्तीभोवती विष्णूच्या दशावताराची शिल्प काढण्यात आली आहेत. प्रवेशद्वारावर विष्णूचे द्वारपाल तलवार आणि शस्त्र घेऊन उभा आहे,येथे प्रवेशद्वारावर गंगा, जमुना, सरस्वती आणि गणेशाची छोटी मूर्ती कोरलेल्या आहेत.

जगन्नाथ मंदिर :-
हे मंदिर १९२७ मध्ये शिवरी नारायण मंदिरापासून काही अंतरावर, पुरीच्या जगन्नाथ मंदिराप्रमाणेच बांधले गेले. येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यावेळी देवाचा रथ ओढण्यासाठी लांबून लोक येतात. हे भगवान जगन्नाथाचे मूळ निवासस्थान मानले जाते.
शबरी मातेचे मंदिर :-
शिवनारायणापासून ३ किलोमीटर अंतरावर खरोड नावाच्या गावात शबरी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर सिरपूरच्या लक्ष्मण मंदिराप्रमाणे विटांनी बनवलेले आहे, हे मंदिर राज्य सरकारने संरक्षित केलेले आहे. येथेच लक्ष्मणेश्वर महादेव मंदिर आहे. तसेच प्राचीन इंदल (इंद्रदेव) चे मंदिर आहे. हे पाहण्यासारखे ठिकाण आहे.
फणिकेश्वर महादेव मंदीर :- रायपूरपासून ७० किमी अंतरावर फिंगेश्वर शहरात एक प्राचीन त्रियातन शैलीचे प्राचीन मंदीर आहे. त्रियातन म्हणजे तीन गर्भगृहे आणि एकच सामायिक मंडप. या तीन गाभाऱ्यापैकी मुख्य गाभार्यात फणिकेश्वर महादेव असून दुस-या गाभाऱ्यात शंख, गदा आणि पद्म,चक्र धारण केलेले विष्णू स्थानक मुद्रेत असून तिसऱ्या गाभाऱ्यात मंदिराचा कलश ठेवला आहे.
फणिकेश्वर महादेव फिंगेश्वर
या मंदिराचा मंडप सोळा खांबांवर बांधलेला आहे. पाली आणि जांजगीरच्या कलचुरी काळातील मंदिरांच्या कारागिरीइतकी मंदिराची वास्तुकला सुबक आणि सुंदर नाही. कलाकुसरीच्या दृष्टिकोनातून येथील शिल्प हि तेराव्या किंवा चौदाव्या शतकाच्या नंतरचा काळातील मानता येतील.
फणिकेश्वर महादेव मंदीरावरील कामशिल्प
मंदिराच्या भिंतीवर ( मंडोवरावर ) द्विजंगा म्हणजे दोन थरात शिल्पपट असून काळ्या दगडांवर कोरलेल्या मूर्ती आहेत. यामध्ये भक्ती रस आणि भोग शिल्प दोन्ही दिसून येतात. त्या काळातील शिल्प परंपरेप्रमाणे मिथुन शिल्प दिसतात. या काम शिल्पामध्ये वात्सायनाच्या कामसूत्रात वर्णन केल्याप्रमाणे चुंबन, आलिंगन , संभोग करणे इ. शिल्प दिसतात यासोबतच राम आणि कृष्णाशी संबंधित मूर्तीही पाहायला मिळतात.

गंधर्वांंचे नृत्य गायन शिल्प
भिंतीवरील शिल्पात मुरलीधर, अहिल्या उध्दार, हनुमानाची शिवपूजा, उमा महेश्वर, नरसिंह अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, मेघनाद आणि लक्ष्मण यांच्यातील युद्ध, नृत्यांगणा आणि वादक, दर्पणसुंदरी, मुग्धा यांनाही स्थान देण्यात आले आहे.
 |
| मिथुनांकन फ़णीकेश्वर महादेव |
मिथुन शिल्प फणिकेश्वर महादेव
या मंदिराच्या उभारणीमागे सहा महिन्यांच्या रात्रीची एक आख्यायिका प्रचलित आहे. ठरलेल्या दिवशी मंदिर तयार झाले पण मंदीरावर कळश ठरलेल्या वेळेत बसवता आला नाही आणि गर्भगृहात त्याची स्थापना करण्यात आली.

रामायणाच्या घटनेचा शिल्पपट
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी इथले राजे शिकारीसाठी जंगलात आले होते. इथे आल्यावर झाडाझुडपांनी वेढलेलं हे सुंदर मंदिर पाहिल्यावरच त्यांनी या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फिंगेश्वरीला आपल्या संस्थानाची राजधानी बनवले आणि सर्व धार्मिक विधी या शिवालयातच केले जाउ लागले.

काम शिल्प फणिकेश्वर महादेव
फणिकेश्वर महादेव मंदीरा या परिसरात पंचकोशी साजर्या केल्या जाणार्या यात्रेत असलेले एक मंदीर आहेत, येथे मकर संक्रांतीच्या वेळी पंचकोशी यात्रा होते. असे मानले जाते की विष्णूच्या नाभी पद्माच्या पाच पाकळ्या चंपारण, पटेवा, फिंगेश्वर, कोपरा आणि बाह्मणेश्वर नावाच्या ठिकाणी पडल्या आणि त्यांच्यापासून चंपेश्वर, पाटेश्वर, फणिकेश्वर, कर्पुरेश्वर आणि बाह्मणेश्वर अशी शिवलिंगे पाच कोसांमध्ये प्रकट झाली आणि तेव्हापासून भक्तांनी पंचकोशी यात्रा साजरी करायला सुरवात केली.
फणिकेश्वर महादेव या नावावरुनच आपल्याला समजते कि हे मंदीर कलचुरी राजांच्या अधिपत्याखाली फणीनाग वंशाच्या शासकांनी बांधले असावे. अर्थात एन शिल्पकलेच्या परमोच्च काळात याची उभारणी झाली नसली त्यामुळे येथील शिल्पाकलेत सुंदरता आणि सफाई नसली तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही.या मंदीराया भिंतीवर असलेली काम शिल्प खजुराहोच्या मंदिरापेक्षा कमी नाहीत आणि छत्तीसगडच्या इतिहासात हे मंदीर म्हणजे एक मौल्यवान वारसा आहे.
उमा महेश्वर यांचा दरबार
शक्ती उपासनेचा सण म्हणजे दसरा येथे अडीच शतके परंपरेने साजरा केला जातो.मात्र हा सण दशमी तिथीऐवजी त्रयोदशीला साजरा केला जातो. या दिवशी सर्व मंदिरांमध्ये ध्वजारोहणासह पूजा केली जाते. मग राजवाड्यातून एक शोभायात्रा काढली जाते आणि पुर्ण नगरभ्रमण केले जाते. यानंतर, यानंतर राजवाड्यात पान सुपारी देउन पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा पाळली जाते.
बरसूर (बस्तर) ची विनायकी मूर्ती :- बाणासूर (बस्तर छत्तीसगड) येथील बरसूर शहराच्या संग्रहालयात गणेशाच्या अनेक मूर्ती ठेवल्या आहेत, येथे सुमारे २० - २५ गणेशमूर्ती आहेत.सर्वात मोठी गणेशमूर्तीही येथे आढळते. इथे स्त्री रुपात गणेशमूर्ती पहायला मिळते.
सनातन धर्मात भगवती ही मूळ आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे .माता सरस्वती, विद्येची देवी, महालक्ष्मी, संपत्तीची देवी आणि सर्व शक्तींची अधिपती दुर्गा यांसारख्या स्त्री रूपात विविध शक्तींची पूजा केली जाते. महादेवाची अर्धनारीश्वराच्या रूपात पूजा केली जाते, तर श्रीहरीनेही जगाच्या कल्याणासाठी मोहिनीचे रूप धारण केले होते. भगवान गणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव विनायकी आहे, म्हणजेच गणेशाची वैशिष्ट्ये असलेली स्त्री. धार्मिक शास्त्रांमध्ये गणपतीची स्त्री रूपात पूजा केली जाते आणि त्याला विनायकी, गजानना, विद्योश्वरी आणि गणेशिनी असेही म्हटले जाते. ही सर्व नावे भगवान गणेशाच्या संबंधित नावांची स्त्रीलिंगी रूपे आहेत. बुद्धिमत्तेचा देव गणेशाला विविध नावांनी ओळखले जाते - जसे की गणेश, विनायकी, गजानना, विघ्नेश्वरी आणि गणेशनी, ही सर्व नावे गणेशाच्या संबंधित नावांची स्त्रीलिंगी रूपे आहेत. या चिन्हांवरून तिला शक्तीचे रूप म्हणजे गणेशाचे स्त्री रूप मानले गेले आहे.

विनायकीला कधीकधी चौसष्ट योगिनींपैकी एक मानले जाते. तथापि,काही विद्वानांच्या मते हत्तीमुखी देवी विनायकी, गणेशाची ब्राह्मणी शक्ती आणि तांत्रिक योगिनी या तीन भिन्न देवी आहेत. एक स्वतंत्र देवी म्हणून, हत्तीमुखा देवी जैन आणि बौद्ध परंपरेत देखील आहे. बौद्ध ग्रंथात त्याला गणपतीह्रदय असे म्हटले आहे. हत्तीमुख देवीची सर्वात जुनी मूर्ती राजस्थानमधील रायध येथे सापडली. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ते इ.स. पहिल्या शतकापर्यंतच्या काळातील उध्वस्त झालेली मातीची मुर्ती आहे. हत्तीचे तोंड असलेल्या या देवीची सोंड उजवीकडे वळलेली असून तिला दोन हात आहेत. तिच्या हातातील चिन्हे आणि इतर खुणा नष्ट झालेल्या स्वरूपात असल्याने हि मुर्ती देवीचीच आहे कि नाही याची खात्रॉ देता येत नाही.
बिहारमध्ये असलेली पालकालीन विनायकीच्या मुर्ती सोंड नाही. चार हात असलेली ही देवीने गदा, घटा, परशु आणि कदाचित मुळ धारण केलेल आहे. प्रतिहारकालीन चित्रामध्ये विनायकी एका हातात गदा, एक कमळ, एकात कमळ, एका हातात अज्ञात वस्तू आणि मोदकांची थाळी ज्यामध्ये सोंड घालून मोदकाचे भक्षण करताना दाखवले आहे. दोन्ही चित्रांमध्ये,सोंड उजवीकडे वळलेली आहे. राणीपूर झरियाल (ओरिसा), गुजरात आणि राजस्थानमध्येही चार हात किंवा दोन हात असलेली मात्र उध्वस्त झालेल्या अवस्थेतील विनायकीच्या मूर्ती सापडल्या आहेत. सतना येथे सापडलेल्या आणखी एका मूर्तीमध्ये विनायकी ही पशुस्वरुपात असलेल्या पाच देवींपैकी एक आहे. मध्यभागी, गौमुखी योगिनी, वृषभाने बाल गणेशाला हातात धरले आहे. विनायकीची मूर्ती लहान आणि सोंड असलेली आहे.तसेच तीच्या हातात गणेशाप्रमाणे पाश आहे. विनायकीची मूर्ती श्री बालसुब्रमण्य स्वामी मंदिर, चेरियानाड, अलप्पुझा, केरळ येथेही आढळते.

गणेशाच्या जन्माशी संबंधित एका कथेत, हत्तीच्या डोक्याची राक्षसी मालिनी, गणेशाची आई पार्वतीचे स्नान पाणी पिऊन गणेशाला जन्म देते. स्कंद पुराणात, धनाची देवी, लक्ष्मीला हत्तीचे डोके होइल असा शाप देण्यात आला, मात्र त्याचे प्रायश्चित्त करून आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ती मुक्त होते. मात्र या मुर्तींना विनायकी म्हटले जात नाही आणि याना गणेशाची आई (मालिनी) किंवा तिच्यासारखीच मुर्ती लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. हरिवंश, वायु पुराण आणि स्कंद पुराणात हत्तीमुखी मातृका, ग्रह आणि गण यांचेही वर्णन आहे त्यांची नावे गजानन, गजमुखी आणि गजस्य आहेत. असे असूनही, कुषाण काळात या मात्रिंकांशी संबंधीत जेष्ठा देवी मानले आहे, जीचे वर्णन हत्तीमुखी असे केले जाते.
मत्स्य पुराणात, विनायकी हि एक मातृका आहे जिची निर्मिती भगवान गणेशाचे पिता भगवान शंकराने, राक्षस अंधकाचा पराभव करण्यासाठी केली होती. या संदर्भात, तीला गणेशाऐवजी शिवाची शक्ती म्हणून पाहिले जाऊ शकते. केवळ तीचे नाव "विनायकी" म्हणजे "विनायक/गणेशाचे आहे". लिंगपुराणातही तीचे नाव शक्तींच्या यादीत आहे. अग्नी पुराण हे पहिले पुराण आहे ज्यामध्ये गणेशाच्या शक्तींची यादी दिली आहे, तथापि, विनायकी त्यांमध्ये नाही किंवा त्यांच्यापैकी एकही गजमुखी नाही, परंतु, त्याच पुराणात, विनायकीचा चौसष्ट योगिनींच्या यादीत समावेश आहे.
तथापि, उप-पुराणामध्ये देवी पुराणात गणेशाची शक्ती म्हणून गणनायकी किंवा विनायकीचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे ज्यात तिचे हत्तीसारखे मस्तक आणि गणेशासारखे विघ्न दूर करण्याची शक्ती आहे आणि तिला नववी मातृका म्हणून समाविष्ट केले आहे. जरी शिल्पामध्ये आणि साहित्यात मातृकांची संख्या सात दाखवली असली तरी पूर्व भारतात नऊ मातृका दाखविल्या जातात. मुळ सात मातृका व्यतिरिक्त, महालक्ष्मी किंवा योगेश्वरी आणि गणेशानी किंवा गणेश यांचा अनुक्रमे आठव्या आणि नवव्या मातृका म्हणून समावेश केला आहे.
मध्ययुगीन गोरक्षसंहिता नाटकात विनायकीचे वर्णन गजमुखी,विशाल उदर असलेली, तीन डोळे आणि चार हात असलेली देवी म्हणून दाखविण्यात आली आहे, जिच्या हातात हळद आणि मोदकांचे ताट आहे. श्रीकुमार यांच्या सोळाव्या शतकातील मूर्तिरत्न या ग्रंथात विंध्य येथे राहणाऱ्या शक्ती-गणपती नावाच्या गणेशाच्या (गणपती) स्त्री स्वरूपाचे वर्णन केले आहे. या देवीला हत्तीसारखे डोके होते आणि तिला दोन सोंडा होत्या. तिचे शरीर एका स्त्रीचे होते, तिचा रंग सिंदूर लाल होता आणि तिला दहा हात होते. तिचे लहान पोट, मोठे स्तन आणि सुंदर शरीर दाखवले आहे. ही मूर्ती बहुधा हिंदू देवी उपासने करणार्या एका पंथातील शक्तीची असावी. तथापि, दोन सोंडेमुळे, हे रूप देखील गणेश आणि त्याच्या शक्तीपैकी एक मानले गेले.
आर्यमंजूश्रीमुलकल्प नावाच्या बौद्ध साहित्यात या देवीला विनायकाची सिद्धी म्हटले आहे. त्यांच्यामध्ये गणेशाची अनेक उपजत वैशिष्ट्ये आहेत. गणेशाप्रमाणेच ती अडथळे दूर करते, तिलाही हत्तीचे डोके आहे आणि तिला एक सोंड आहे. ती भगवान शिवाचे एक रूप भगवान ईशानची मुलगी असल्याचे देखील म्हटले जाते.
मल्हार :-
बिलासपूर शहरापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर मल्हार आहे. येथे जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही त्यामुळे मल्हारला जाण्यासाठी ऑटो उपलब्ध असतात..या परिसरात फिरण्यासाठी एक दिवसासाठी कार भाड्याने घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे या परिसरातील मल्हार - खारोड - तळाला सहजपणे फिरू शकतो आणि या भागातील महत्वाची सर्व पुरातत्व स्थळे बघता येतील.
मल्हार हे प्राचीन काळी महत्त्वाचे शहर असावे. या शहराला राजधानीचा दर्जा होता की नाही. यावर विद्वानांची वेगवेगळी मते आहेत. या शहराचे उत्खनन सागर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागाचे केडी बाजपेयी आणि एसके पांडे यांनी १९७५ ते १९७८ दरम्यान केले होते. ज्यामध्ये मुर्ती, विविध नाणी, मातीची भांडी, शिलालेख आणि इतर वस्तू सापडल्या.
त्यांच्या आधारे या ठिकाणाहून पाच ऐतिहासिक कालखंडाचे पुरावे सापडले.
आद्य ऐतिहासिक काळ ( मौर्य, शुंग, सातवाहन काळ ) इ.स.पुर्व १००० ते इ.स ३००,
इ.स. ३०० ते ३५० शरबपुरिया आणि सोमवंशी कालखंड,
इ.स. ३०० ते ६५० ( सोमवंशी कालखंड )
इ.स.- ६५० ते ९०० ( कलाचुरी कालखंड) -
या कालखंडात इथे एक शहर वसले होते.मात्र यानंतर ते एका ढिगारा होउन राहीले. उत्खननानंतर ७ व्या ते ८ व्या शतकातील मंदिर सापडले.
मल्हार गावाचे मुख्य प्रवेशद्वार
येथे दोन मंदिरे आहेत (पाताळेश्वर मंदिर आणि भीमा किचक मंदिर) हि प्राचीन मंदीर आहेत आणि भाविकांसाठी इथे मोठी वर्दळ असते.
या दोन मंदिरांच्या अवशेषांव्यतिरिक्त, एक मातीचा किल्ला (मल्हार किल्ला) देखील आहे, जो स्थानिकांना देखील फारसा माहिती नाही केवळ ASI दने इथे कुंपण घालून थोडेफार संरक्षित वास्तु म्हणून दर्जा दिला आहे. मात्र या किल्ल्याला भेट द्यायची तर दिवसा गेलेलेच बरे, इथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे आणि बहुतेक अवशेष झाडाझुडूपाखाली दबले गेले आहेत.
पाताळेश्वर मंदिर :-
मंदिराच्या जागेवर आढळलेल्या ऐतिहासिक नोंदीवरून असे दिसून येते की या मंदिराचे नाव केदारेश्वर होते या नोंदीवरून असे देखील सांगितले जाते की हे मंदिर कुम्हाटी येथील सोमराज नावाच्या ब्राह्मणाने बांधले होते. या मंदिराच्या बांधकामाचा काळ सुमारे इ.स. ११६७-६८ दरम्यानचा आहे. हैहया राजवंशातील जजलदेव ( दुसरा ) याच्या कारकिर्दीत याची उभारणी झाली असावी.
मंदीराचे प्रवेशद्वार
पाताळेश्वर मंदीराचे मागून दृष्य
पाताळेश्वर मंदीराचे बाजुने दृष्य
पाताळेश्वर मंदीर- समोरुन
मंदीराची जगती
मंदीराचे अवशेष
गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या द्वारशाखा
 |
गौमुखी पातालेश्वर शिव
|
खाली उतरुन गर्भगृहात प्रवेश करावा लागतो.
मंदीराच्या पीठावर असलेला गजथर
मंदीर परिसरात असलेले अवशेष
मंदीर परिसरात असलेली हनुमानाची मुर्ती
मंदीर स्थापत्यशास्त्रानुसार मंदिर एका उंच पीठावर बांधले गेले आहे .त्याला चौकोनी गर्भगृह आणि मंडप आहे. सध्या मंदिराचा फक्त खालचा भाग शिल्लक आहे आणि बाकीचा अवशेष मंदिराच्या सभोवती विखुरलेले आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून पायऱ्यांच्या चढून आत जाता येते. गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे, जे मंडपापेक्षा खालच्या पातळीवर आहे आणि पायऱ्यां उतरुन गाभार्यात प्रवेश करता येतो.
हे शिवलिंग मंदिराच्या अधिष्ठाणाच्या खालच्या बाजुला असल्यामुळेच मंदिराला पाताळेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले असावे. गंगा, यमुना द्वारपाल यांची शिल्पे असलेला या मंदिराचा दरवाजा हि उत्तम कलाकारीचा आहे तर त्याच्या आतील बाजूस शिव आणि शैव देवतांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिराचे मुळ नाव केदारेश्वर होते जे सध्या पाताळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या भिंतींवर हत्तींचा कळप, सिंह शिल्प, गणेशाची सुंदर मुर्ती आणि फुलांची नक्षी आहे. मंदिराच्या उजव्या भिंतीवर सिंहाचे शिल्प सुंदर दिसते. मंदिरासमोरील उंच पीठावर नंदी आरुढ आहे. कान ताठ असून नेत्र शिवशंकराच्या पिंडीकडे होते.
मंदिरासमोर हनुमानाची सजीव वाटावी अशी मूर्ती आहे. स्थानक मुद्रामध्ये हनुमानाने आपला डावा पाय एका स्त्रीवर ठेवला आहे. एक हात उगारलेला आणि दुसरा हात अभय मुद्रामध्ये दिसत आहे. ही मूर्ती कोणत्या पौराणिक कथेवर आधारित आहे हे समजत नाही. मंदिराच्या आजूबाजूला अनेक अमलक विखुरलेले दिसतात. यासोबतच भुइकोटाच्या खंदकाच्या बाजूला पंचमुखी गणेशाची मूर्तीही दिसते.
उत्खननादरम्यान सापडलेल्या अनेक मंदिरांचे अवशेष मंदिर परिसरात विखुरलेले आहेत, यावरून या ठिकाणी मंदिरांचा समूह असावा असे दिसून येते. मंदिरासमोर अनेक जैन मूर्ती पडलेल्या आहेत. समोर एक संग्रहालयही आहे. मात्र या संग्रहालयात सर्व पुतळे ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही.
भीमा किचक मंदिर :-
मल्हार हे गाव छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात ३२ किलोमीटर दक्षिण-पश्चिम अक्षांश 21 90 उत्तर आणि 82 20 पूर्व रेखांशावर स्थित आहे. बिलासपूर ते रायगड या रस्त्यावर मस्तुरी १८ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून मल्हार, १४ कि.मी. मी दूर आहे. मस्तुरीला गेल्यावर मल्हारकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठे दरवाजा आहे आणि येथून एकच डांबरी रस्ता मल्हारकडे जातो. मल्हार हे पुरातत्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण आहे. इथे काही एकरात पसरलेला मातीचा किल्लाही आहे. मल्हारच्या मातीच्या किल्ल्याचा प्रथम उल्लेख जे. डी. बेगलर १८७३-७४ मध्ये त्यांच्या भेटीदरम्यान. पण त्यांनी या भुइकोटाबद्दल फारसा रस दाखवला नाही. त्यांनी या शहरातील दोन मंदिरांच्या अवशेषांचा उल्लेख केला.
पुराणात उल्लेख केलेल्या मल्लसुर या राक्षसाचा शिवाने वध केला होता. त्यामुळे त्यांचे मलारी, मल्लार हे नाव प्रसिद्ध झाले. या शहराला सध्या मल्हार म्हणतात. मल्हारकडून मिळालेल्या इ.स. ११६४ च्या कलचुरी काळातील शिलालेखात या शहराला मल्लाल पाटणा असे संबोधण्यात आले आहे. विशेषत: येथून जेव्हा दीदनेश्वरी देवीची प्राचीन मूर्ती चोरीला गेली तेव्हा या शहराला अधिक प्रसिद्धी मिळाली . त्यानंतर वृत्तपत्रांतून ते ठळकपणे प्रसिद्ध झाले.
मल्हारमध्ये प्रवेश करताना छत्तीसगड पर्यटनाच्या माहिती फलकावर पाताळेश्वर मंदिराचा रस्ता दाखवण्यात आला आहे. स्थानिक लोक या मंदिराचा उल्लेख "देऊर" म्हणून करतात तर हे मंदिर प्रत्यक्षात भीम कीचक म्हणून ओळखले जाते. पाताळेश्वर महादेव मंदिराप्रमाणेच या मंदिराचाही पुरातत्व खात्याने जीर्णोद्धार केला आहे याच मंदीरासमोरून जाणारा रस्ता मार्ग कासडोल आणि गिरोडपुरीमार्गे रायपूरला जातो. देउर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर मन प्रसन्न होते. मंदीराच्या बाहेरच्या चारही बाजुने सुरक्षा भिंत उभारली आहे. देउर मंदिराचे अवशेष पाहीले तरी हे मंदिर प्रचंड मोठे असावे असे लक्षात येते. मंदिराचे महत्त्व त्याच्या विशालतेतून दिसून येते. बांधकाम शैली आणि मंदीराच्या रचनेचा विचार करता या मंदिराची उभारणी इसवी सन ६ व्या ते ७ व्या शतकाच्या केली असावी.हे मंदीर सोमवंशी शासकांनी बांधले असावी. मंदिराजवळच्या प्रांगणात दोन मोठ्या मूर्तींची मस्तके ठेवण्यात आली आहे. या शिल्प शीर्षांची विशालता पाहून स्थानिक लोका त्यांना महाभारत काळातील भीम-किचक असे मानतात.
भीमा किचक मंदिराचे प्रवेशद्वार - मल्हार
भीम-किचकाची मानली जाणारी शिल्प
भीमा किचक मंदिराचे समोरचे दृश्य – मल्हार
भीमा किचक मंदिराचे बाजूचे दृश्य - मल्हार
भीमा किचक मंदिराचे बाजूचे दृश्य – मल्हार
सध्या या मंदीराची जगती किंवा पीठ बघायला मिळते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सरिता देवतांच्या ( गंगा, यमुना नद्या ) सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या अलंकृत प्रवेशद्वाराची उंची अंदाजे १४ फूट असेल.
मंदिराच्या बांधकामात मोठमोठे दगड वापरण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाजाच्या दगडांचे वजन किमान १० टन असेल.
भीमा किचक मंदिराचे आतील भाग - मल्हार
भीमा किचक मंदिराचे आतील भाग - शिवलिंग - मल्हार
भीमा किचक मंदिराच्या बाहेरील दगडी पटल – मल्हार
ब्रम्हदेव
गंगा- यमुना शिल्प
पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदीराचे आता फक्त गर्भगृह आणि अंतराळ हेच शिल्लक आहे. गर्भगृहाची भिंत किंवा मंडोवर शिल्लक आहे. गर्भगृहात एक शिवलिंग आहे, यामुळेच मंदिराच्या दरवाजाच्या ललाटबिंबावर शिवाच्या गणांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, वेगवेगळ्या आसनांमध्ये शिव आणि गणांचे शिल्पांबरोबरच मंदिराच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना यांच्या मुर्ती देखील आहेत. दारात असलेल्या नदी देवतांच्या शिल्पामध्ये वस्त्र कोरतानाचे बारकावे विलोभनीय आहे. मुख्य दरवाजाच्या द्वारशाखेवर परिहारांच्या मुर्ती आहेत. दरवाजावरील असलेली नक्षी पाहून सिरपूरच्या तिवर देव विहाराची आठवण होते. मंदिराच्या भिंतीमध्ये बर्याच मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवर प्राणी, पक्षी, यक्ष, यक्षिणी, गंधर्व, कीर्तिमुख, वाहक इत्यादींच्या मूर्ती प्रमुख आहेत. महादाराच्या द्वारशाखेवर ब्रह्मदेवाला यज्ञ करताना उमा महेश्वरासह कार्तिकेय कोरलेला आहे. मंदीर बघून कारागिराने आपले काम चोखपणे पार पाडले आहे असे मनात येते.
कीर्तिमुख
 |
| पंचमुखी गणेश |
 |
| पाताळेश्वर मंदीराच्या प्रवेशद्वारावर असलेली उभी ( स्थानक ) लक्ष्मी विष्णु मंदीर |
 |
| सरीता देवता आणि सहकारी |
 |
| शरभ शिल्प |
 |
| गजथर |
 |
| नंदी |
 |
| भग्न मंदीराचे अवशेष |
भीमा किचक मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेली शिल्प
मंदीराच्या दरवाज्यावर एक अपुर्ण अवस्थेतील मुर्ती बघायला मिळते. ही मूर्ती महिषासुर मर्दानीची असावी, मात्र एवढ्या मोठ्या आणि भव्य मंदिरात फक्त एकच शिल्प अपूर्ण ठेवण्याचे कारण काय समजत नाही.तसेच मंदीरावर कीर्तीमुखाची शिल्प बघायला मिळतात. भगवान शिवाचा हा गण शिवमंदिरांमध्ये दाखवला जातोच. कीर्तिमुखाला शिवाने वरदान दिले होते.
भीमा किचक मंदिराजवळ एक मोठी पाण्याची टाकी – मल्हार
मल्हार किल्ला :-
एकेकाळॉ इथे भुईकोट किल्ला होता मात्र आज त्याचे फारसे अवशेष दिसत नाही. जिथे हा किल्ला होता तिथे आता पुरातत्व खात्याने पाटी लावली आहे.
सभोवती कुंपणही घातले आहे. आता मात्र इथे झुडपेच दिसतात. मुळात किल्ल्याचे काहीही अवशेष उरले नाही आणि भिंतीचा काही भाग आता पूर्णपणे वनस्पतींनी व्यापलेला आहे.
म्युझियम :-
२५ -३० वर्षांपूर्वी मल्हारमध्ये प्राचीन मूर्ती इतक्या विखुरल्या होत्या की, महाशिवरात्रीच्या मेळ्यात येणारे गाडे चालक मूर्तींची चूल करून अन्न शिजवायचे. मल्हार गाव हे प्राचीन शिल्पांनी भरलेले शहर होते. सध्याचे मल्हार गाव मल्लरपट्टण शहराच्या अवशेषांवर वसलेले आहे. प्रत्येक घरात काही जुना दगड किंवा शिल्प अक्षरशः दैनंदिन कामात वापरला जातो. कलचुरींच्या काळात हे शहर प्रसिद्धीच्या शिखरावर होते. पण काही घटना घडल्या, त्यामुळे याचे महत्व कमी झाले. सध्या इथे असलेले म्युझियम हे वस्तुसंग्रहालय म्हणावे इतके नक्कीच मोठे नाही, प्रत्यक्षात एका खोलीत अस्ताव्यस्तपणे शिल्प पडलेली आहेत.
 |
| संग्रहालय |
 |
| शेष नारायण |
वस्तुसंग्रहालय कसेबसे उभे आहे. धड प्रकाश पुरेसा नाही.सरकारकडून भरपूर निधी मिळूनही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी वस्तुसंग्रहालयात मुलभुत सुवीधा पूर्ण करण्याकडे का दुर्लक्ष करतात,वस्तुसंग्रहालयात दारातच शेषशायी विष्णूची चार हातांची शस्त्र धारण केलेली मूर्ती दिसते. त्याचा डावा पाय त्याच्या उजव्या मांडीवर ठेवला आहे, नाभीतून बाहेर पडलेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. लक्ष्मी त्याच्या पायाशी दाखवली आहे. पुतळा भग्न अवस्थेत आहे, डोळे आणि नाक भग्न झालेले आहेत.
 |
| कुबेर |
पुढे गेल्यावर कुबेराची मूर्ती दिसते. मुकुट परिधान केलेल्या कुबेरने उजव्या हातात पृथ्वी आणि डाव्या हातात पैशाची थैली धरली आहे. पैसा नसेल तर तो कुबेर कसला? त्यामुळे कारागीर कुबेरचे पोट गणेशासारखे मोठे करतात आणि त्याच्या हातात पैशाची थैली दाखवतात.
 |
| वीरभद्र |
संग्रहात वीरभद्राची सुंदर मूर्तीही ठेवण्यात आली आहे. शिवा मंदीरामध्ये वीरभद्राची मूर्तीही दाखवली जातेच. वीरभद्र हा शिवाचा गण होता ज्याने शिवाच्या आज्ञेवरून दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. देवसंहिता आणि स्कंद पुराणानुसार शिवाने आपल्या केसांपासून 'वीरभद्र' नावाचा गण तयार केला. महादेवजींचे सासरे राजा दक्ष यांनी यज्ञाचे आयोजन केले आणि जवळपास सर्व देवांना यज्ञात आमंत्रित केले परंतु त्यांनी महादेवजींना किंवा त्यांची मुलगी सती यांना आमंत्रित केले नाही. हा आपल्या वडिलांचा यज्ञ आहे असे समजून सती न बोलावता तेथे पोहोचली, परंतु जेव्हा तिने पाहिले की आपल्या पतीला आमंत्रण दिलेले नाही किंवा तिचा सन्मान केला गेला नाही, तेव्हा तिने तेथे आत्महत्या केली. ही बातमी महादेवजींना मिळताच त्यांनी दक्ष आणि त्याच्या सल्लागारांना शिक्षा करण्यासाठी आपल्या केसांपासून ‘वीरभद्र’ नावाचा एक गण तयार केला. वीरभद्र आपल्या इतर गणांसह आला आणि त्याने दक्षचा शिरच्छेद केला आणि त्याच्या साथीदारांनाही शिक्षा दिली.
 |
विष्णु
 | | स्कंद माता |
|
इथे स्कंधमातेची मूर्तीही आहे. पौराणिक कथांमध्ये भगवान शंकराला एक पुत्र कार्तिकेय देखील आहे, तो भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' या नावानेही ओळखला जातो. प्रसिद्ध देव आणि अससुराच्या युद्धात तो देवांचा सेनापती झाला. पुराणात कुमार आणि शक्ती असे संबोधून त्यांचा महिमा सांगितला आहे. भगवान स्कंदाची माता असल्यामुळे पार्वती मातेचे हे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
 |
| शिव पार्वती |
एक मूर्ती नंदीवर बसलेली शिव आणि पार्वतीची आहे, ज्यामध्ये नंदी वेगाने पुढे जात आहे, त्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत दिसत आहेत. पार्वती नंदीचा लगाम हातात धरून आहे. या पुतळ्यात शिवाचा चेहरा भग्न आहे, कोणीतरी शिल्प तोडले आहे.
 |
| विष्णू |
यासोबतच एक अप्रतिम शिल्पही या संग्रहात आहे. ज्याला युध्दसज्ज विष्णूची मूर्ती म्हणतात.या मुर्तीच्या एका हातात सरळ तलवार आहे, डोक्यावर टोपी आहे आणि त्याच्या कानात कुंडले तसेच एका बाजूला चक्र दाखवले आहे. या मुर्तीचा पोषाख चिलखतासारखा आहे आणि पायात लांब बुट दाखवले आहेत. या पुतळा नेमका कोणाचा यावरुन तज्ञांत मतभेद आहेत, काहींच्या मते ती विष्णूची मूर्ती आहे, काहींना हा पुतळा ग्रीक योद्ध्यासारखा वाटतो.
 |
| आदिनाथ तीर्थंकर |
संग्रहालयात इतर अनेक शिल्प आहेत, ज्यात जैन-बौद्ध मुर्ती दिसतात.
डिड़नेश्वरी माता मंदीर :-
मल्हार गावाच्या पूर्व दिशेला सुमारे १ किलोमीटर अंतरावर डिडनेश्वरी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या उजव्या बाजूला एक मोठा तलाव असून मंदिरासमोर पक्क्या बांधणीचा तलावही आहे. ज्यामध्ये ग्रामस्थ कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक सुरक्षारक्षक नेमलेला आहे. मंदिराचे गर्भगृह लोखंडी दरवाजे लावून बंद करण्यात आले असून, बाहेरूनच दर्शन घेता येते. मंदिरात नवीन बांधकाम सुरू झाले आहे. गर्भगृहासमोर मोठा मंडप बांधला जात आहे.
 |
| डिड़नेश्वरी मंदिर परिसर |

 |
अजून बांधला जात असलेला मंडप |
मल्हारमध्ये सागर विद्यापीठातर्फे उत्खननाचे काम करण्यात आले होते. तज्ञांच्या मते हे शहर इ.स.पूर्व चौथ्या शतकातील आहे. येथे इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील एक विष्णूमूर्ती सापडली, ज्यावरून पूर्वीचे राजे वैष्णव धर्माचे अनुयायी होते याचा अंदाज लावता येतो. यानंतर शैव पंथाचा प्रभाव येथे वाढला असावा. हे शहर मौर्य काळापासून १३-१४ व्या शतकापर्यंत प्रगत आणि विकसित झाले असावे. तंत्रपूजेची सुरुवातही शैवांपासून झाली. मल्हारमध्येही शाक्तांचा प्रभाव आहे. इथे स्कंदमाता, दुर्गा, पार्वती, महिषासुर मर्दानी, लक्ष्मी, गौरी, कंकाली, तारादेवी आदी देवींच्या मूर्ती सापडल्या आहेत. पण डिडनेश्वरी देवीची काळ्या ग्रॅनाइटची अप्रतिम मूर्तीही सापडली आहे.
 |
| डिड़नेश्वरी माता |
डिडनेश्वरी या नावाबाबत सांगायचे तर डिडवा म्हणजे अविवाहित प्रौढ पुरुष आणि डिडिन म्हणजे कुमारी मुलगी. हे आहे. डिडनेश्वरी ही शक्ती किंवा पार्वतीचे रूप आहे, जेव्हा पार्वती शंकराशी विवाह होण्यापुर्वी हिमालयाची मुलगी गौरी होती, तेव्हा शिवाची प्राप्ती होण्यासाठी तीने या मल्हारच्या प्रदेशात म्हणजे शैवांचे प्राबल्य असणार्या प्रदेशात तप केले होते अशी मान्यता होती. डिडनीदेवीचे मंदिर हे संपूर्ण मल्हार आणि आसपासच्या लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. जणू संपूर्ण मल्हारच्या परिसरातील धार्मिक भावनेला काळ्या चमकदार दगडापासून बनलेल्या डिडनीमातेच्या मुर्तीने प्रेरित केले आहे.
 |
| राजपुरुष: डिड़नेश्वरी मंदिर मल्हार |
डिडनेश्वरी देवीची मूर्ती चोरण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला त्यात दुर्दैवाने चोरट्यांना यश आले. यादरम्यान या मुर्तीच्या चोरीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने हि मुर्ती प्रसिध्दीच्या झोतात आली. त्यानंतर अचानक हा मुर्ती सापडली देखील. या मंदीराची उभारणी प्राचीन मंदीराच्या अधिष्ठाणावरच केली आहे. या परिसरात मल्लाह म्हणजे निषाद लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक डिडनेश्वरी मातेला आपली आराध्य देवता मानतात. डिडनेश्वरी मातेची अंजली मुद्रेतील म्हणजे हात जोडलेल्या मुद्रेतील मुर्ती खुपच आकर्षक आहे. गर्भगृहाच्या डाव्या बाजुला एका राजपुरुषाचे शिल्प होते. मात्र हे शिल्प कोणत्या राजाचे आहे हे समजत नाही.
हि देवी कलचुरी घराण्याची कुलदेवता आहे. देवार गीतांमध्ये या देवीला राजा वेणुची आराध्य देवता मानले गेली आहे. डिडनेश्वरी देवीला कलचुरी काळातील म्हणजे अकराव्या शतकातील सर्वश्रेष्ट कलाकृती मानली गेली आहे. काळ्या ग्रॅनाईटमधील हि मुर्ती चार फुट उंच आहे. मुर्तीला प्रभावळ असून छत्र आणि सहदेवता दाखवल्या आहेत. पण त्याचबरोबर बाहुबंध, कर्णफुले, कमरबंध, पैंजण, मणिहार असे दागिने दाखवले आहेत. मुर्तीच्या मागच्या बाजुला नउ देवता दाखवल्या आहेत. या नउ देवतांची कथा अशी आहे कि असुरांकडून युध्दात हरल्यावर सर्व देव पार्वतीला शरण गेले. त्यावर पार्वती मातेंने पद्मासनात बसुन ध्यान केले. त्यावेळी या नउ देवता प्रगट झाल्या आणि त्यांनी असुरांना हरवले.
रामायणकालीन खरदूषणांचे नगर : खरौद
तपोभूमी छत्तीसगडला प्राचीन काळी दक्षिण कोसल म्हणून ओळखले जात असे. रामायणात उल्लेखिलेला हा दंडकारण्य प्रदेश घनदाट जंगले, निसर्गाचे नियम पाळून रहाणारे रहिवासी, वन्य प्राण्यांसाठी आदर्श निवासस्थान, खनिजे आणि नयनरम्य नैसर्गिक वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तीर्थक्षेत्रांची कमतरता नाही. येथे विविध पंथांचे मठ, मंदिरे आणि देवस्थान ही या प्रदेशातील विशिष्ट संस्कृती आणि परंपरांची ओळख आहे, शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध धर्म तितकेच वाढले आणि बहरले. प्रयागराज राजीम, रतनपूर, डोंगरगढ, खल्लारी, दंतेवाडा, बरसूर, देवभोग, सिहावा, अरंग, भीमखोज, सिरपूर, भोरमदेव, मल्हार, शिवरीनारायण, तळा, जंजगीर, पाली, खरौड, दीपदीह, दंतेवाडा, भैरमगड, कावर्धा, गिरोह, अमरुद, गिरीपूर ध्यानाच्या पवित्र स्थळे आहेत.
असेच एक प्राचीन तीर्थक्षेत्र खारोद नगर हे साबरी तीर्थ शिवनारायणापासून ३ किमी अंतरावर आणि राजधानी रायपूरपासून १२० किमी अंतरावर आहे. प्रभू रामाने येथे खर आणि दुषण यांचा वध केला होता, त्यामुळे या ठिकाणाचे नाव खरोड पडले असे सांगितले जाते. खरौड शहरात अनेक प्राचीन मंदिरे असल्यामुळे याला छत्तीसगडची काशी असेही म्हणतात. येथील लक्ष्मणेश्वर महादेव मंदिराची स्थापना भगवान रामाने आपला भाऊ लक्ष्मण याच्या सांगण्यावरून खर आणि दुषण यांचा वध करून केली होती. म्हणून याला लक्ष्मणेश्वर मंदिर म्हणतात.




लक्ष्मणेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम ८ व्या शतकातील असल्याचे मानले जाते, त्याच्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे ज्याची स्थापना लक्ष्मणने स्वतः केली असे मानले जाते. या शिवलिंगाला एक लाख छिद्रे आहेत म्हणून याला लक्षलिंग म्हणतात. या लाखो छिद्रांपैकी एक छिद्र असे आहे की ते पाताळात जाते, त्यात जे काही पाणी टाकले जाते ते सर्व शोषले जाते, तर एक छिद्र म्हणजे अक्षय कुंड, जे नेहमी पाण्याने भरलेले असते. लक्षलिंगाला अर्पण केलेले पाणी मंदिराच्या मागे असलेल्या तलावात जावे, कारण तलाव कधीच कोरडा होत नाही, अशीही एक मान्यता आहे. लक्ष्य लिंगाला स्वयंभू लिंग देखील मानले जाते.
हे मंदिर शहराच्या पश्चिम दिशेला मुख्य दैवत म्हणून पूर्वाभिमुख आहे. मंदिराला चारही बाजूंनी मजबूत दगडी भिंत आहे. या भिंतीच्या आत ११० फूट लांब आणि ४८ फूट रुंद व्यासपीठ आहे, ज्याच्या वर 48 फूट उंच आणि 30 फूट घेर असलेली मंदिरे बांधलेली आहेत. मंदिराच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की पूर्वी या मचाणावर मोठे मंदिर बांधण्याची योजना होती, कारण त्याचा खालचा भाग स्पष्टपणे मंदिराच्या आकारात बांधलेला आहे. व्यासपीठाच्या वरच्या भागाला परिक्रमा म्हणतात. सभा मंडपाच्या पुढच्या भागात सत्यनारायण मंडप, नंदी मंडप आणि भोगशाळा आहेत.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सभामंडप आहे. भिंतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी एक शिलालेख आहे. येथील शिलालेखात आठव्या शतकातील इंद्रबल आणि इशानदेव नावाच्या शासकांचा उल्लेख आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला संस्कृत भाषेतील शिलालेख आहे. यात ४४ श्लोक आहेत. रत्नापूरचे राजे चंद्रवंशी हयहयवंशात जन्मले. या शिलालेखात त्यांनी अनेक मंदिरे, मठ आणि तलाव इत्यादी बांधल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार रत्नदेव तिसऱ्याला राल्हा आणि पद्मा नावाच्या दोन राण्या होत्या. राल्हा यांना सांप्रद आणि जिजक नावाचे पुत्र होते. पद्माला खड्गदेव नावाचा सिंहासारखा मुलगा होता, जो रत्नापूरचा राजा झाला आणि लक्ष्मणेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. आठव्या शतकापर्यंत मंदिर जीर्ण झाले होते आणि जीर्णोद्धार आवश्यक असल्याचे यावरून दिसून येते. या आधारावर काही विद्वान ते सहाव्या शतकातील मानतात.

मूळ मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कलाकृतींनी सजवलेले दोन दगडी खांब आहेत. यापैकी एका खांबावर रावणाने कैलासोत्तलन आणि अर्धनारीश्वराची दृश्ये कोरलेली आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्तंभात राम-सुग्रीव मैत्री, बळीचा वध, शिव तांडव यासारख्या रामाच्या चरित्राशी संबंधित दृश्ये आणि तलवार चालवणारा पुरुष, स्त्री आणि पुरुष यांच्या सामान्य जीवनाशी संबंधित दृश्ये कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर गंगा-यमुनेची मूर्ती आहे. शिल्पांमध्ये मकर आणि कछापा वाहने स्पष्टपणे दिसतात. त्याच्या बाजूला दोन स्त्री शिल्पे आहेत. याच्या खाली प्रत्येक बाजूला जय आणि विजय या द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेर परिक्रमेत राजा खड्गदेव आणि त्याची राणी हात जोडून बसवली जातात. दरवर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेत शिवाची मिरवणूक काढली जाते आणि या लक्ष्मणेश्वर महादेवाच्या मंदिरात श्रावणी व महाशिवरात्रीला श्रावणी महिन्यात जत्रा भरते.
प्राचीन कुशावती शहर: कोसीर
रामाच्या वनवासाच्या मार्गाच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासाची १३ वर्षे दंडकवनात घालवली. हे निश्चित आहे की प्राचीन काळी दक्षिणपथाचा मार्ग हा उत्तर परिसर आणि दक्षिणेला असलेल्या दंडकवनाद्वारे जोडत असे आणि या मार्गाचा वापर यात्रेकरू आणि इतर लोक करत होते. जिथे तुर्तुरियाच्या वाल्मिकी आश्रमात वैदेही सीतेने लव आणि कुश यांना जन्म दिला असे मानले जाते. इथल्या लोकांच्या समजुतीनुसार लवण हे लवाने वसवलेले तर कोसीर हे कुशाने वसवलेले शहर मानले जाते कोसीर हे रायगड जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे, ते सारंगढपासून १६ किमी अंतरावर आणि राजधानी रायपूरपासून सरायपली, सरसिन्वा मार्गे सुमारे २१२ किमी अंतरावर आहे. या गावापासून काही अंतरावर बालोदाबाजार, रायगड आणि जांजगीर जिल्ह्यांच्या सीमाही आहेत, त्यामुळे याला तिनसियावर वसलेले गावही म्हणता येईल.


कोसीर हे कौशल्येश्वरी देवीचे प्रसिद्ध ठिकाण आहे, ज्याला स्थानिक भाषेत कुसलाई दै म्हणतात. नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची गर्दी असते आणि लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे "पूजा" देखील करतात. मंदिराच्या गर्भगृहात महिषासुर मर्दिनीची प्राचीन मूर्ती एका उंच पीठावर काँक्रीटने बनवलेली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या दगडी बांधलेल्या अवशेषांची विचार करता हे कलचुरी काळात ११ व्या-बाराव्या शतकात या ठिकाणी दगडी बांधलेले मंदिर असावे असा अंदाज येतो. ते कोसळल्यानंतर ते पुन्हा बांधण्यात आले.
गावाच्या आजूबाजूच्या शेतात आणि तलावातही प्राचीन मूर्तींचे अवशेष सापडल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. कोसीर गाव ज्या प्रकारे एका ढिगाऱ्यावर वसलेले आहे, त्यावरून या ढिगाऱ्याखाली प्राचीन वस्ती असावी असे दिसते. प्राचीन वस्त्यांवर नवीन वसाहती उभ्या राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी जुन्या वस्त्या टाकून त्यांच्या जवळ नवीन गावे व वस्त्या निर्माण झाल्या आहेत. सध्याचे कौशल्येश्वरी मंदिर हे प्राचीन पायावर बांधलेले असून, या पायाची उंची सुमारे १० फूट असेल. या मंदिराजवळ पश्चिम दिशेला धुकुरिया तलाव आणि दक्षिण दिशेला पाण्याचे तळे आहे, ज्यामुळे त्याची पुरातनता सिद्ध होते.

छत्तीसगड प्रदेशात प्राचीन काळापासून मातीचे किल्ले बांधण्याची परंपरा आहे. सुरक्षेसाठी खंदक असलेले किल्ले बांधले जात असून आज त्यांची संख्या ४८ च्या पुढे गेली आहे. सध्या डमरू उत्खननात बौद्ध स्तूप सापडले आहेत, यावरून या मातीच्या तटबंदी असलेल्या किल्ल्यांची प्राचीनता सिद्ध होते. कोसीरच्या सीमेभोवती अनेक तलाव आहेत, ते पाहून असे वाटते की येथे कधी काळी मातीची भिंत असलेला किल्ला असावा. कालांतराने, खंदक मातीने भरले गेले. कोसीर गावात ५६ एकरांचा मोठा बांधवा तलाव आहे. जे सिंचनाचे प्रमुख स्त्रोत आहे.
CG TEMPLE : जांजगीर चांपा
छत्तीसगडमधील जांजगीर चंपा येथे भगवान विष्णूचे एक अद्वितीय मंदिर आहे, जे त्याच्या बांधकामापासून अपूर्ण आहे आणि ते कधीही पूर्ण होऊ शकले नाही. छत्तीसगडचा कलचुरी राजा जाज्वल्य देव पहिला याने ११ व्या शतकात भीमा तलावाच्या काठावर मंदिर बांधले होते. हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सप्तरथ वितानानुसार बांधलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ शिखर नसलेले विमान ( विमान म्हणजे गर्भगृह आणि शिखर यांना मिळून म्हणतात ) आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला दोन कलात्मक खांब आहेत, ज्याला पाहून असे समजते की, प्राचीन काळी मंदिरासमोर महामंडप बांधला होता, परंतु आता त्याचे फक्त अवशेष उरले आहेत.



मंदिराभोवती अतिशय सुंदर आणि सुशोभित मूर्ती कोरल्या आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती रूपातील मूर्तीही येथे स्थापित आहे. त्याच्या उजवीकडे गरुडावर विराजमान विष्णूची मूर्ती आहे, मंदिराच्या मागील बाजूस सूर्यदेव विराजमान आहे. मुर्तीचा एक हात तुटलेला आहे पण रथ आणि त्याला जोडलेले सात घोडे स्पष्ट दिसत आहेत. येथे खाली, कृष्णकथेशी संबंधित शिल्पामध्ये, वासुदेव कृष्ण दोन्ही हात डोक्यावर उचलून फिरताना दाखवले आहेत. खालील भिंतींवर अशीच अनेक शिल्पे बनवली आहेत. कधीतरी वीज पडून मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मुर्ती विखुरल्या गेल्या. नंतर मंदिराची डागडुजी करताना त्या मूर्ती भिंतींवर बसवण्यात आल्या.
मंदिराच्या सभोवतालच्या इतर कलात्मक शिल्पांमध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांमधील वामन, नरसिंह, कृष्ण आणि राम यांच्या मूर्तींचा समावेश आहे. छत्तीसगडच्या कोणत्याही मंदिरात या विष्णू मंदिराप्रमाणे रामायणाशी संबंधित इतकी शिल्पे कुठेही आढळत नाहीत. एवढी सजावट करूनही मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती नाही. मंदिर अपूर्ण असल्याने मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही.
मंदिराच्या अपूर्णतेची काय कथा?
या मंदिराच्या बांधकामाशी संबंधित अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. यातील एका आख्यायिकेनुसार, काही लोक या चैत्र मासातील रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठराविक कालखंडात शिवनारायण मंदिर आणि जांजगीरचे हे मंदिर बांधण्यात स्पर्धा झाली. जे मंदिर आधी पूर्ण होईल त्या मंदिरात प्रवेश करणार असल्याची घोषणा भगवान नारायणाने केली होती असे म्हणतात. प्रथम शिवनारायणाचे मंदिर पूर्ण झाले आणि त्यात भगवान नारायणांनी प्रवेश केला. जंजगीरचे विष्णू मंदिर अपूर्ण राहिले.
महाबली भीमाशी संबंधित आणखी एक आख्यायिकाही प्रचलित आहे. मंदिराला लागून असलेला भीमा तलाव भीमाने पाच वेळा खोदला होता, असे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार या मंदिराचे शिल्पकार म्हणून भीमाचे वर्णन केले जाते. यानुसार एकदा भीम आणि विश्वकर्मा यांच्यात एका रात्रीत मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली होती. त्यानंतर भीमाने या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले. मंदिराच्या बांधकामादरम्यान भीमाची छिन्नी आणि हातोडा खाली पडला की त्याचा हत्ती परत आणायचा. असे अनेकवेळा घडले, पण शेवटच्या वेळी भीमाची छिन्नी जवळच्या तलावात गेली, जी हत्ती परत आणू शकली नाही आणि सकाळ झाली. भीमाला स्पर्धा हरल्याचे खूप दुःख झाले आणि रागाच्या भरात त्याने हत्तीचे दोन तुकडे केले. त्यामुळे मंदिर अपूर्ण राहिले. आजही मंदिराच्या आवारात भीम आणि हत्तीची खंडित मूर्ती आहे.
राजा तालाब : हल्बा टिकरापारा, जिल्हा कांकेर :-
साधारण १९५६-५७ ची गोष्ट आहे, बस्तरचा राजा प्रवीणचंद भांजदेव सध्याच्या कांकेर जिल्ह्यातील हलबा गावातील टिकरापाडा येथे पोहोचला, संपूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी जमले. गावकऱ्यांनी गावच्या चौकात आसन उभे करुन त्यांचे स्वागत केले. राजाचे आगमन होताच गावातील सर्व नागरिक जमा झाले.राजाने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्याचे लांब केस खांद्यावर विखुरले होते. राजा त्याच्याशी समस्यांवर चर्चा करू लागला. हा स्वातंत्र्योत्तर काळ होता, ज्यामध्ये देशाची लोकशाही रुजत होती आणि विकासाची पावले पडत होती.
गावकऱ्यांनी सांगितले की, गावात पाण्याची समस्या आहे, बहुतेकजण विहिरी आणि नाल्यांवर अवलंबून आहेत.तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना ५००/- दिले आणि त्यातून तलाव बांधण्यास सांगितले. तलावासाठी जागा निवडल्यानंतर संपूर्ण गाव तलाव बांधण्यात व्यस्त झाला. तलावाच्या बांधकामाचे काम सुमारे 3 वर्षे सुरू राहिले आणि त्यानंतर 3 एकर जागेत "राजा तालब" बांधण्यात आला. बांधकाम सुरू असताना पैशाची कमतरता भासली की, गावातील काही लोक जगदलपूरला जाऊन राजाकडून पैसे आणत. अशा प्रकारे एकूण बारा हजार रुपये खर्चून तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. राजा तलावाच्या पलीकडे गावकऱ्यांनी शिवमंदीर ही बांधले.
तलाव बांधल्यानंतर त्यासाठी योग्य जागा निवडली गेली नसल्याचे गावकर्यांच्या लक्षात आले. तलावाच्या आजूबाजूला शेतं होती, त्यात पाणी यायला मार्ग नव्हता, तो फक्त पावसाच्या पाण्यामुळे भरत होता. पावसाचे दिवस संपत आले कि या तलावाचे पाणी शेतात मुरते. तलावाची मातीही वालुकामय असल्याने पाणी साचत नाही. सध्या या तलावाचे पाणी गढूळ झाले आहे आणि अजूनही लोक त्यातूनच पाणी वापरत आहेत.
तुरतुरिया: वाल्मिकी आश्रम आणि लवकुशचे जन्मस्थान :-
तुरतुरिया हे रायपूर ते पटेवा-रावण-रैतुम मार्गे सुमारे ११८ किमी आहे. रयतम नंतर इथपर्यंत कच्चा रस्ता आहे. कदाचित अभयारण्यात पक्क्या रस्त्याच्या बांधकामाला परवानगी नाही. रस्त्याच्या उजव्या बाजूला वाल्मिकी आश्रम बांधला असून उजव्या बाजूला नाल्याच्या काठी शेतात काही दुकाने दिसतात. आश्रमात काही इमारती बांधल्या आहेत, जवळच बांधलेल्या तलावात भाविक स्नान करतात. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. |
| वाल्मीकि आश्रम तुरतुरिया |
 |
| तुरतुरीया येथील नाद करत वाहणारी धारा |
डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे नयनरम्य ठिकाण आहे, त्रेतायुगात वाल्मिकींनी वैदेही सीतेला येथे आणले होते आणि येथे लवकुशचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. डोंगरातून एक ओढा निघतो ज्यामध्ये पाण्याचा प्रवाह बारा महिने असतो. तुर्रे येथून वाहणारे पाणी "तुर-तूर" च्या आवाजाने जमिनीवर पडते, त्यामुळे या ठिकाणाचे नाव तुरतुरिया पडले. आता ओढ्याच्या प्रवाहावर गायमुख बनवण्यात आले असून त्याच्या दोन्ही बाजूला दगडी मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
 |
| जल कुंड |
 |
| तुरतुरिया |
इथे विष्णूची एक स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे आणि दुसरी मूर्ती पद्मासनात बसलेल्या मुकुटधारी विष्णूच्या योगमुद्रेत आहे. हि मुर्ती बुध्दाची असल्याचा गैरसमज आहे. सन १९१४ मध्ये तत्कालीन ब्रिटीश आयुक्त एच.एम.लॅरी यांनी या जागेचे महत्त्व ओळखून येथे उत्खनन केले, ज्यामध्ये अनेक मंदिरे आणि प्राचीन मूर्ती सापडल्या. H M Lari यांच्या नावाचा शिलालेख गायीच्या मुखावर लावलेला आहे. प्राचीन
मंदिराचे अवशेष इकडे तिकडे पसरलेले होते जे या आश्रमात बाजूला ठेवल्र
होते. नंतर नव्याने बांधलेल्या मंदिरात बसवण्यात आले आहेत. द्वारपाल,
दंडधर, गणेश, शिवलिंग, नंदी, केशिवध आदी मूर्ती येथे ठेवण्यात आल्या आहेत.
योनिपीठात बसवलेले शिवलिंग हे मंदिराच्या दगडी कलशासारखे दिसते. ज्याच्या
वर नारळ आहे आणि तळाशी कमळ आहे.
कृष्णाने केशीला मारल्याचे आणि दुसरी मूर्ती वत्सासुरच्या वधाची आहे , मात्र यांना लव कुशाची शिल्प मानली जातात
हे
लवकुशचे जन्मस्थान मानण्याचे कारण म्हणजे येथे सापडलेल्या दोन मुर्ती
आहेत, या मुर्तीपैकी एका शिल्पात तलवार धारण केलेल्या योध्द्याचे कोपर एका
घोड्याने आपल्य तोंडात दाबून धरले आहे आणि तो योध्दा त्या घोड्याशी लढत
आहे, दुसरी मूर्ती मध्ये एक वीर पुरुष एका वृषभाशी लढताना दाखवला आहे. या
मूर्तींवरून लवकुशने अश्वमेधचा घोडा थांबवला होता,त्याचा हा शिल्पपट असावा
असा अंदाज लावला गेला आणि हे ठिकाण लवकुशचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाऊ
लागले. या दोन मूर्तींमध्ये पहिली मूर्ती कृष्णाने केशीला मारल्याची आणि
दुसरी मूर्ती वत्सासुरच्या वधाची आहे. या दोन्ही मूर्ती कृष्ण लीलाशी
संबंधित आहेत. आता या दोन मूर्तींमुळे हे ठिकाण लवकुशचे जन्मस्थान म्हणून
ओळखले जाऊ लागले आहे. पण हा स्थानिका लोकांचा श्रद्धेचा मुद्दा आहे जो
शतकानुशतके टिकणार आहे.
केशीचा वध आणि वत्सासुर मारणाऱ्या या मूर्ती लवकुश मानल्या जातात.
या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून असा अंदाज करता येईल कि सातव्या किंवा
आठव्या शतकात इकडे तिकडे भव्य मंदिर बांधले गेले असावे. ज्यांचे अवशेष या
ठिकाणी दिसतात. मंदिराच्या दगडी खांबांचे मुर्तीकाम पाहता तो ओरिसातील
कारागिरांनी बांधला असावा असे वाटते. कारण खांबांची सजावट त्याच शैलीत
दिसते. आश्रमाच्या आजूबाजूला अनेक तुटलेल्या मुर्ती आहेत, त्या जतन
करण्याची गरज आहे. एकंदरीत हे ठिकाण रमणीय आहे, पाणी उपलब्ध असलेल्या अशा
वनक्षेत्रात अनेक दिवस राहता येते. आश्रमाच्या वरच्या टेकडीवर अस्वल आणि
बिबट्यांची मुक्त संचार आहे,त्यामुळे इथल्या मुक्कामात खबरदारी घेणे आवश्यक
आहे.
मातागढ तुरतुरिया :
पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुर्तुरियामध्ये तीन दिवसीय जत्रा
आयोजित केली जाते. याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी एक यात्रा समिती स्थापन
केली असून, त्यांच्याकडून जत्रा आयोजित केली जाते.यात्रेच्या वेळी
दुकानदारांची गर्दी होती. ग्रामीण भागातील जत्रा हे स्थानिक लोकांच्या
परस्पर भेटीसाठी मोक्याचा दिवस असतो. या ठिकाणाचे महत्त्व वाढल्याने या
ओढ्याला ‘सुरसरी गंगा’ असे नाव देण्यात आले आहे. तो पार केल्यावर समोर
टेकडीवर मातेचे मंदिर असून या जागेला मातागड असे म्हणतात, देवीच्या ठिकाणी
जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.

ओढ्यापासून जवळच एका
आश्रमात यज्ञकुंड बांधण्यात आले असून, त्याच्या जवळच एक बुद्ध मुर्ती धम्म
प्रवर्तन मुद्रेत आहे, मात्र मुर्तीचे शीर भग्न झाले आहे. याशिवाय इतर काही मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. बुद्ध मूर्तीचा चेहरा कोणीतरी नष्ट केला आहे. या आश्रमाच्या भिंतीवर दोन मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. यांची कलाकुसर उत्कृष्ट आहे. वेशभूषाही सुरेख करण्यात आली आहे. इथून पुढे गेल्यावर टेकडी चढून गेल्यावर एक मैदान दिसते, इथे उजव्या बाजूला एका भग्न इमारतीचे खांब दिसतात आणि या ठिकाणी मोठमोठ्या विटाही पडलेल्या आहेत. दगडी खांबांसमोर कोणीतरी कालीची मूर्ती बसवली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञच्या मते, हे अवशेष बुद्ध विहाराचे आहेत, परंतु हे एखाद्या मंदीराचे उध्वस्त अवशेष वाटतात.

पूर्वी मातागढ मंदिराजवळ यज्ञ केले जात होते, परंतु आता यज्ञ मंदिराजवळ केले जात नाहीत. असे मानले जाते की देवीला अर्पण केलेला तांदूळ बकरीने चावला किंवा खाल्ल्यास देवी बलिदान स्वीकारते म्हणुन बकरीला तांदूळ खाण्यासाठी मंदिरात नेले जाते. आश्रमाच्या समोर असलेल्या पायर्या चढून आपण वनविभागाने बांधलेल्या विश्रामगृहाकडे जाउ शकतो. इथे "वैदेही विहार" असा फलक बसवला आहे. यापुढे अभयारण्याचा प्रदेश सुरु होतो. या परिसरात कोठेही मोबाईला रेंज नाही. आश्रमाच्या वरच्या टेकडीवर वनविभागाने विश्रामगृह बांधले मात्र त्यात सध्या प्राण्यांचा वावर आहे. या ठिकाणी मात्र मोबाईलला रेंज येते.
बालसमुंड आणि सिद्धेश्वर मंदिर : -
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून बालोदाबाजार रस्त्यावर ७० किमी अंतरावर पलारी गावात बालसमुंद तलावाच्या काठावर पलारीचे सिद्धेश्वर मंदिर वसलेला आहे. दक्षिण कोसलात विटांनी मंदिरे बांधण्याची परंपरा आहे. या तलावाच्या काठावर सिद्धेश्वर नावाचे विटांचे शिवमंदिरही आहे. हे मंदिर इसवी सन ७-८ व्या शतकात बांधले गेले. इश्तिकाने बांधलेले हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या द्वाराशाखेवर त्रिभंगमुद्रामध्ये गंगा आणि यमुना नद्याच्या देवींच्या स्वरुपात शिल्पांकन केले आहे. महाद्वारावर असलेल्या ललाटबिंबावर शिवशंकराच्या विवाहाचा देखावा सुंदररित्या कोरलेला असून दरवाजाच्या द्वारशाखेवर आठ दिक्पालांची शिल्प आहेत.

सिद्धेश्वर मंदीराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित केले आहे. या मंदिराचा शिखरावर कीर्तिमुख, गजमुख आणि व्याला यांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. छत्तीसगडच्या सध्या उभ्या असलेल्या वीटांनी बांधलेल्या मंदिरांचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. लोककथेनुसार, हे मंदिर आणि तलाव नायकांनी अठ्ठ्याशी रात्रीत बांधले होते. या प्रदेशात मिठाचा व्यापार करणाऱ्या भटक्या नायक जाती आहेत. त्यांचा तांडा मीठ घेऊन दूरवर व्यापारासाठी घेउन जात असे.


जेव्हा नायकांचा मुक्काम या परिसरात पडत असे तेव्हा त्यांना नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असे. म्हणून त्यांनी येथे तलाव बांधण्याचे काम सुरू केले. (नायकांनी तलाव बांधल्याची कहाणी इतर ठिकाणीही ऐकायला मिळते. खारुण नदीचे उगमस्थान असलेले पेटचुआचा तलावही नायकांनीच बांधला होता. यावरून असे दिसून येते की नायक त्यांच्या वाटेवर जलस्रोत निर्माण करायचे. मात्र हा तलाव बांधल्यानंतर त्यात पाणी नव्हते, म्हणून एका ऋषींच्या सांगण्यावरून वीरांच्या सरदाराने आपल्या नवजात बाळाला एका पात्रात ठेवले आणि ते तलावात सोडले, त्यानंतर तलावामध्ये खूप पाणी आले. तलाव काठोकाठ भरला. मूलही भांड्यात सुखरूप वर आले. तेव्हापासून या तलावाचे नाव बालसमुंद पडले. हा तलाव १२० एकरांवर पसरलेला आहे. पाणी स्वच्छ आणि शुध्द आहे. तलावाचे पाणी कधीच आटत नाही. जेव्हा तुम्ही तलावाच्या काठावर उभे राहता आणि पाण्याचा विस्तार पाहता तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही समुद्रकिनारी उभे आहात. त्याची विशालता त्याचे नाव सार्थ करते.तलावाच्या मध्यभागी एक बेट आहे, तलाव खोदताना वाहून गेलेल्या मातीपासून ते तयार झाल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की तलाव खोदणारे कामगार संध्याकाळी घरी जाताना टोपल्या (बांबूच्या झाडूने) माती टाकत असत. त्यामुळे या बेटाची निर्मिती झाली. यावरून तलावाच्या बांधकामादरम्यान किती कामगार काम करतात याचा अंदाज लावता येतो.
१९६०-६१ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रिजलाल वर्मा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केली होती. दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी जत्रा भरते, त्यामध्ये हजारो भाविक येतात आणि बालसमुंडात स्नान करतात.या मानवनिर्मित तलावाला त्याच्या विशालतेमुळे जलाशय म्हणतात.
सुरगुजाचा रामगिरी :-
छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमीटर अंतरावर, बिलासपूर रस्त्यावर उदयपूरच्या दक्षिणेला रामगड पर्वत आहे. दंडकारण्यच्या प्रवेशद्वाराजवळ, समुद्रसपाटीपासून ३,२०२ फूट उंचीवर असलेल्या, या अद्वितीय नैसर्गिक वैभव असलेल्या रामगिरीने प्राचीन इतिहास आणि संस्कृती जपली आहे आणि शतकानुशतके स्थापित झाली आहे. येथे, घनदाट, थंड सावलीच्या झाडांची थंडता असलेला जगातील एकमेव प्राचीन मंच तीर्थक्षेत्र "शैलगृहाकार नाट्यमंडपा"चे अवशेष आहे. हे ठिकाण रामायण काळात शरभंग ऋषींचा आश्रम होता असे मानले जाते. येथे सीता बेंगरा आणि जोगी मारा नावाच्या प्राचीन लेण्या आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासातील काही काळ रामगढ पर्वताच्या गुहेत सीतेसोबत राहिल्यामुळे उत्तरेकडील गुहेचे नाव सीता बेंगरा पडले.
 |
| जिथे मेघदुत हे काव्य रचले ते ठिकाण रामगड |
कविकुलगुरू महान कवी कालिदास यांनी येथे मेघदूत रचले होते. मेघदूत कथेतील यक्ष जोगीमाराच्या दक्षिणेकडील गुहेत स्वगृहापासून दुर येथे येउन राहिला होता. जोगी मारा गुहेत कोरलेल्या पुरातन भित्तिचित्रांचे पुरावे आहेत.तज्ञ त्याचा काळ ईसापूर्व तिसरे शतक मानतात. ही भिंत चित्रे अजिंठा आणि वेरुळच्या लेण्यांमध्ये कोरलेल्या भित्तीचित्रांसारखीच आहेत, हि भित्तीचित्रे या ठिकाणच्या प्राचीन सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहेत. कोरिया राज्याचे दिवाण रघुवीर प्रसाद यांनी लिहिलेल्या झारखंड झंकार या पुस्तकात रकसेल घराण्यातील विष्णू प्रताप सिंह याने रामगढ येथे एक किल्ला बांधला आणि येथे ३५ वर्षे राज्य केले असा उल्लेख आहे.
 |
| हातीपोल नावाचा बोगदा |
रामगड पर्वतातील लेण्यांपर्यंत जाण्यासाठी हातीपोल नावाचा बोगदा आहे. हा नैसर्गिक बोगदा १८० फूट लांब असून तो इतका उंच आहे की त्यातून हत्तीही सहज प्रवेश करू शकतो. दोन्ही लेण्यांमध्ये ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील शिलालेख आहेत. त्यापैकी सीता बेंगरा हे प्राचीन विहार आहे. कर्नल ओस्ले यांनी १८४३ मध्ये ते शिलालेख प्रकाशित केले आणि जर्मन अभ्यासक डॉ. ब्लोच यांनी १९०४ मध्ये जर्मन जर्नलमध्ये ते प्रकाशित केले. यानंतर डॉ. बर्गेस यांनी इंडियन एंटीक्वेरी (भारतीय पुरातन वास्तू ) या ग्रंथामध्ये त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे.
 |
| सीता बेंगरा गुहा |
सीता बेंगरा गुहा प्राचीन काळी डोंगरामध्ये कोरली होती असे मानले जाते. ४४ फूट लांब आणि १५ फूट रुंद सीता बेंगरा गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला श्री राम चरण चिन्ह कोरलेले आहे. त्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, अर्धगोलाकार आकाराच्या दगडाने बनवलेल्या पायऱ्या आहेत. खांब गाडण्यासाठी प्रवेशद्वाराजवळील सपाटीत दोन छिद्रे करण्यात आली आहेत. या गुहेचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून पूर्वेला एक टेकडी आहे. भारतीय नाटका मंच्याच्या या आदिम अवस्थेच्या आधारावरच भरतमुनींनी गुफाकृती नाट्यमंडपाला त्यांच्या पुस्तकात स्थान दिले असावे, असे विद्वानांचे मत आहे - कार्यः शैलगुहाकारो द्विभूमिर्णाट्यमंडप.
या गुहेच्या प्रवेशावेळी डाव्या बाजूला ३ फूट ८ इंच लांबीचा अर्धमागधी भाषेतील दोन ओळींचा शिलालेख हा पहिला काव्यस्वरुपातील असलेला शिलालेख मानला जातो. प्रा. व्ही के परांजपे यांच्या "ए फ्रेश लाइट ऑन मेघदूत" नुसार शिलालेख खालीलप्रमाणे आहे "आदि पयंति हृदयम् सर्वागरु काव्यो ये रतयम... दुले वसन्तीय! "हसवानुभूते कुद स्पितम एवम् अलगेती" अर्थात हि भावना व्यक्त करणारा स्वभावानेच कवीच असणार !
 |
| जोगीमारा गुहेत मौर्य ब्राह्मी लिपीत शिलालेख |
जोगीमारा गुहेत मौर्य ब्राह्मी लिपीत एक शिलालेख आहे जो सुतानुका आणि तिचा प्रियकर देवदत्त यांच्याबद्दल सांगतो. जोगीमारा गुहेच्या उत्तरेकडील भिंतीवर पाच ओळी कोरल्या आहेत - शुतनुक नम। देवदार्शक्यि। शुतनुकम। देवदार्शक्यि। तं कमयिथ वलन शेये। देवदिने नम। लुपदखे। म्हणजेच सुतानुका नावाची देवदासी (सुमारे) वरुण (रा. बनारस) चा उपासक श्रेष्ठ देवदिन नावाचा रूपदक्षाच्या प्रेमात पडली. यावरून जोगीमारा गुहेची नायिका सुतानुका असल्याचे दिसून येते. आचार्य कृष्णदत्त वाजपेयी यांच्या मते, शिलालेखावरून असे दिसते की सुतानुका नावाची एक नर्तिका होती, जिच्यासाठी देवदासी आणि रूपदर्शिका हे दोन शब्द वापरले गेले आहेत. तिच्या प्रियकराचे नाव देवदत्त होते. बहुधा देवदत्तने वरील लेखन गुहांमध्ये कोरलेले असावे, जेणेकरून त्यांच्या नाट्यप्रेमी सुतानुकाचे नाव त्या ठिकाणी अजरामर होईल.
 |
| गुहा शैल चित्र जोगीमारा गुफ़ा |
जोगीमारा गुहेत यक्षाचे वास्तव्य होते अशी लोक समजुत आहे. येथे नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या चित्रांना ऐतिहासिक महत्त्व आहे. या यक्षाच्या मुक्कामाच्या कक्षात सर्वात जुनी भिंत चित्रे आजही आपल्याला प्राचीन कला आणि संस्कृतीची आठवण करून देतात. एका बाजूला फुलांच्या आणि पानांच्या कमानींच्या पार्श्वभूमीत तीन घोड्यांनी ओढलेला रथ दाखवला आहे आणि दुसऱ्या बाजूला रंगीबेरंगी मासे रेखाटलेले आहेत. लाल, काळ्या आणि पांढऱ्या रंगात चित्रित केलेली चित्रे जोगीमारा गुहेत सामुहिक नृत्य आणि संगीतासह उत्सव साजरा करणाऱ्या मानवी आकृतींचे चित्रण केले आहे. तज्ञांनी ही चित्रे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील असल्याचे मानले आहे. डॉ. हिरालाल हे भित्तिचित्र बौद्ध धर्माशी संबंधित असल्याचे मानतात आणि रायकृष्ण दास म्हणतात की ते जैन धर्माशी संबंधित आहेत कारण पद्मासनातील एका व्यक्तीची आकृती चित्रित केली आहे आणि ती कलिंग राजा खारवेलाने बनवली असल्याचे मानले जाते. जैन ऋषी कांती सागर यांनी या लेणीतील काही चित्रांचा विषय जैन धर्माशी संबंधित असल्याचे मानले आहे. या चित्रांमध्ये इतिहास आहे. फक्त ते समजण्याची, जाणून घेण्याची गरज आहे.
रामगड्वर असलेल्या मंदिरातील सीता, लक्ष्मण, हनुमान एवं रामाची मुर्ती
महामहोपाध्याय डॉ. भास्कराचार्य जी त्यांच्या "रामगढमधील त्रेतायुगाची नाट्यशाळा" या लेखात लिहितात की, "रामगढ टेकडी केवळ रामायण आणि महाभारत काळातील अवशेषांनी समृद्ध नाही, तर नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहे, परंतु प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी सर्वात प्राचीन आहे.
श्रीरामाची दैवी पावलांच्या पादुका
डॉ. भास्कराचार्य जी "रघुपतिपदैरकिंटम मेखलासु" मध्ये म्हणतात की आजही त्रेतायुगीन रंगमंच दंडकारण्यच्या प्रवेशद्वारावर आहे, श्रीरामांची पावले जिथे प्रथम पडली त्या शरभंग आश्रमाच्या कुशल कारागिरांनी पादुका कोरल्या. छिन्नीने श्रीरामाची दैवी पावलांचे ठसे काढले आणि ते कायमचे जतन केले. महान कवी कालिदास यांची काव्यप्रतिभा या पदचिन्हांच्या पूजेच्या दोन हजार वर्षांपूर्वीच बहरली असावी, म्हणूनच रामगिरीची ओळख सांगताना त्यांनी मेघदूताच्या बाराव्या श्लोकात म्हटले आहे-
आप्रिच्छस्व प्रियसख्मु तुंगमलिंग्य सैलं वंद्ययः मेघपुनसख्खं पूणसख्खं श्रुतिः । . काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य स्नेहविक्ताश्चिरविरहजं मुचान्तो वाफर्मुष्णम् ।
सीता बेंगरा गुहेत श्री रामाच्या पावलांचे पादुका स्पष्टपणे दिसून येतात. यक्ष दुतरुप मेघाला म्हणतो की माझे मित्र वेळोवेळी या पर्वतावर येतात, मला असे वाटते की प्रत्येक वेळी तू दूर राहून, त्यांची आठवण करून, तू पाण्याच्या रूपात गरम अश्रू ओघळतोस. जे पावसाच्या रुपात पडतात.
 |
“वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयम" रामगिरि पर्वत
|
रामगडमध्येच या आश्रमाचा अवशेष दिसून येतात. इथे सात दरवाजे असलेल्या विशाल मंदिराचे अवशेष आजही बघायला मिळतात जिथे शिलालेखांत सुतानुका देवदासींच्या नृत्याचे वर्णन करतात. जवळच असलेल्या थार पर्वतातून मांड नदी उगम पावून वाहते, याच नदीच्या काठीने राम शरभंग आश्रमाच्या दिशेने पुढे निघाले.
कालिदासांनी रामगडच्या गुहेत राहूनच मेघदूताची रचना केली असे काही तज्ञांचे मत आहे. कालिदासांनी आपल्या मेघदूतात रामगडाला रामगिरी म्हटले आहे. “वप्रक्रीडापरिनाटगजप्रेक्षणीयम्” पूर्वमेघ-२ मध्ये रामगिरी पर्वताच्या शिखराचे वर्णन वनक्रीडा करणाऱ्या हत्तीप्रमाणे केले आहे. यावरून असे दिसते की कवी कालिदास यांनी रामगढातूनच मेघदूत रचले होते. रामगिरी पर्वत मेघदूताच्या पुराव्याची पडताळणी केल्यानंतर तज्ञांनी रामगढ पर्वताची ओळख रामगिरी म्हणून केली आहे. यावरून कालिदासाचा रामगिरीशी सखोल संबंध असल्याचे सिद्ध होते. यक्षाने येथे वास्तव्य करून प्रियाला प्रेमाचा निरोप दिला. शरभंग ऋषींचा आश्रम आणि रामगढमधील भगवान राम आणि सीता यांचे निवासस्थान, त्यांच्या वनवासात दंडकारण्यचे प्रवेशद्वार, या सर्व बाबी या परिसराला थेट त्रेतायुगाशी जोडते.
सरगुजाची कैलाश गुंफ़ा :-
छत्तीसगड राज्याच्या अनोख्या नैसर्गिक सौंदर्या बरोबरच त्याचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. राज्यातील सुरगुजा भागातील हिरवीगार जंगले, पर्वत आणि नद्यांचे सौंदर्य मनाला आनंद देणारे आहे. प्रत्येक ठिकाण पौराणिक इतिहासाचा संदर्भ असलेले आहे रायपूरपासून अंबिकापूर ३५८ किलोमीटर अंतरावर आहे. या शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर समरबार नावाच्या ठिकाणी कैलास गुंफा आहे. अंबिकापूरहून बटौली मार्गे पठारावर पोहोचलो कि इथून जंगलाच्या वाटेने जावे. आपण गयाबुडा नावाच्या गावातून डावीकडची वाट धरून कैलास गुहेत पोहोचतो. गयाबुडा येथून रस्ता पांडरपत मार्गे थेट बगीचा आणि जशपूरला जातो. हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे.

येथे आदिवासी समाजाचे संत रामेश्वर गहिरा गुरूजी यांनी नैसर्गिक गुहेतील खडक कोरून तिला सध्याचे स्वरूप दिले आहे. कैलास गुहेच्या खाली एक धबधबा वाहतो, जिथे स्थानिक लोक धार्मिक विधी करतात. या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांती मिळते
या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि महत्त्व पाहून गहिरा गुरूजींनी ते स्थान आपल्या पूजेसाठी निवडले. घनदाट जंगलात आश्रम, गुहा, वाहणारे धबधबे आणि पक्ष्यांचे मधुर आवाज मन मोहून टाकतात. शहराच्या गजबजाटापासून दूर राहून या नैसर्गिक ठिकाणी एक-दोन दिवस घालवावे असे वाटतं.
निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे अतिशय आदर्श ठिकाण आहे. येथे वर्षभर भाविक, पाहुणे आणि पर्यटक येत असतात. या सुंदर ठिकाणी अनेक पौराणिक कथा देखील आहेत. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच वाढते. धबधबा पूर्ण बहरात असतो, जंगल परिसरात लहान-मोठे वन्य प्राणीही दिसत आहेत.
सारासोर सरगुजा :-
छत्तीसगड प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्याची तुलना नाही. नद्या, पर्वत, धबधबे, गुहा, वन्य प्राणी इत्यादींमधून आपण निसर्गाच्या जवळ जातो. सुरगुजा परिसराला निसर्गाचे विशेष वरदान लाभले आहे, चहूबाजूंनी हिरवाईने वेढलेली प्राचीन ठिकाणे असलेले रमणीय वातावरण माणसाला भुरळ घालते.

असेच एक ठिकाण अंबिकापूर-बनारस रस्त्यावर ४० किमी अंतरावर भैंसमुदापासून १५ किमी अंतरावर आहे, ज्याला सारसोर म्हणतात. या ठिकाणाला शतकानुशतके पौराणिक महत्त्व आहे. येथे नदीचा शुद्ध प्रवाह दोन डोंगर कापून वाहतो. हे ठिकाणी हिंदूंचे धार्मिक स्थळही आहे. सारसोर हे जलाशय आहे, येथे महान नदी खरात आणि बरका या दोन पर्वत कापून पूर्वेकडे वाहते.
प्राचीन काळी खरात आणि बरका हे दोन्ही पर्वत एकमेकांना जोडलेले होते अशी आख्यायिका आहे. जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या वनवासाच्या काळात जेव्हा येथे आले, तेव्हा ते पर्वताच्या पलीकडे राहिले. डोंगरात एक गुहा आहे तिला जोगी महाराजांची गुहा म्हणतात. सरसोरच्या पलीकडे सारा नावाच्या राक्षसाने गोंधळ घातला होता, त्याला मारण्यासाठी रामांनी सोडलेल्या बाणाने हा पर्वत वेगळा झाला आणि बाणाने पर्वताच्या पलीकडे जाऊन सारा राक्षसाचा वध केला. तेव्हापासून या ठिकाणाचे नाव सरसोर पडले.

सारसोरमध्ये, दोन पर्वतांच्या विभक्त केलेला भाग मध्यभागी असून तो स्वागतद्वार म्हणून अस्तित्वात आहे. खालच्या भागात तलावा सारख्या आकारात नदी असून ती बऱ्यापैकी खोल आहे, त्याला सीताकुंड म्हणतात. सीताजींनी सीताकुंडमध्ये स्नान केले होते आणि येथे काही काळ घालवल्यानंतर त्या नदीच्या काठाने डोंगराच्या पलीकडे गेल्या. पुढे महान नदी ओडगी गावाजवळ रेण नदीला मिळते. दोन्ही पर्वतांचे कापलेले खडक बघीतले असे दिसते की जणू नदीचा प्रवाह या दिशेने जाण्यासाठी कोणीतरी परिश्रमपूर्वक डोंगर कापला आहे.
सध्या हे मंदिर नदीच्या मध्यभागी एका छोट्या टेकडीवर बांधलेले आहे. काही साधू पर्णकुटी बांधून येथे राहतात आणि ते मंदिरात पूजाअर्चा करतात. या ठिकाणी भाविकांचा अखंड राबता असतो. या नयनरम्य ठिकाणी गेल्यावर नदीच्या काठावर एक-दोन दिवस राहावेसे वाटते. मंदिर समितीने बांधलेली पर्यटक निवासस्थानेही आहेत. इथे रात्रीचा मुक्काम समितीच्या परवानगीने करता येईल.
कसे पोहोचायचे? - अंबिकापूर ते बनारस मार्गावर सतत वाहनांची सोय असून भैंसा मुडा येथे पोहोचल्यानंतर स्थानिक वाहनाचा वापर करता येतो. मात्र स्वतःच्या साधनाने जाणे चांगले.
हिंगलाज मातेचे स्थान :-
सूरजपूर जिल्ह्यातील प्रतापपूरच्या येथे प्राचीन मंदीरे आहेत.प्रतापपूरच्या सर्व देवता रक्सेल राजांच्या पूर्वीच्या राज्यातील होत्या. त्यावेळी येथे गोंड राजे राज्य करत होते. राजाने बांधलेली अनेक मंदिरे आहेत ज्यांची अखंड पूजा केली जाते. येथे चबुतऱ्यावर एक गोल दगडी खडी टाकण्यात आली आहे. ‘हिंगलाज’ मातेचे स्थान असे त्यांचे वर्णन केले जाते. आश्चर्य वाटण्याचे कारण होते. ज्याप्रमाणे ग्रामीण भागात देवगुडी आहे आणि ठाकूर देवता कोणत्याही छताशिवाय मचाणावर बसतात, त्याचप्रमाणे येथे ‘हिंग्लज’ माँही उपस्थित होती.
हिंगलाज माता प्रतापपूर सुरगुजा छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी हिंगलाज मातेचे स्थान आढळत नाही. तसेच कोणत्याही उत्खननात देचीची मुर्ती सापडली नाही. हिंगलाज मातेची तीन ठिकाणे आहेत, पहिले पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये, दुसरी ओरिसातील तालचेरपासून १४ किमी अंतरावर आणि तिसरे हिंगलाज मातेची मूर्ती बाबा कीनाराम यांनी वाराणसी मध्ये एका गुहेच्या कुंडात स्थापन केली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान राज्यातील हिंगोल नदीजवळ हिंगलाज परिसरात असलेले हिंगलाज माता मंदिर हे हिंदू भाविकांचे मुख्य श्रद्धेचे केंद्र आणि प्रमुख ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शंकरांनी माता सतीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली तेव्हा भगवान विष्णूने विश्वाचा विनाश होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने मातेच्या मृतदेहाचे ५१ भाग केले. पुराण कथेच्या मान्यतेनुसार, हिंगलाज हे ठिकाण आहे जिथे मातेचे मस्तक पडले होते.
येथे सती माता कोटटरीच्या रूपात तर भगवान शिव भीमलोचन भैरवाच्या रूपात स्थापित झाले आहेत. या गुंफेच्या परिसरात श्री गणेशाच्या मूर्तीशिवाय कालिका माता, ब्रह्मकुंड, तिरकुंड अशी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत.
हिंगलाज माता गुहेत बसलेली बलुचिस्तान पाकिस्तान
मात्र, छत्तीसगडच्या ग्रामीण भागात देवीच्या भजनात गायल्या जाणाऱ्या पारंपारिक भक्ती गीतांमध्ये (जस गीत) हिंगलाज मातेचा उल्लेख आहे आणि देवीच्या ज्या निरनिराळ्या रूपांची पुजा केली जाते त्याचप्रमाणे हिंगलाज मातेचीही पूजा केली जाते.

हिंगलाज माता, बलुचिस्तान, गुहेत स्थापन झालेल्या देवीचे पाकिस्तानमधील भक्त
सारंगगड बिलासपूर रोडवरील भाटगावजवळ देवसागरमध्ये हिंगलाज माता आहे, हिंगलाज मातेची मुर्ती येथील सारंगगडचा राजा दुसरीकडून आणत होता तेव्हा ती येथेच स्थापित झाली, अशाप्रकारे छिंदवाडा जिल्ह्यातील हिंगलाजचे हे एक भव्य मंदिर निर्माण झाले. मातृपूजा किंवा शक्ती पूजा ही भारतीय संस्कृतीच्या एक आहे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि ती आराधना लोकसंस्कृतींमध्ये दिसून येते. अर्थात निरनिराळ्या ठिकाणी या देवतेचे नाव, स्थान आणि भाषा भिन्न असू शकतात..छत्तीसगडमध्ये हिंगलाज मातेला बंजारी, बुधीमाई, माई, महामाई, इत्यादी म्हणतात. .
सुतियापथ (सहसपूर लोहारा पासून सुमारे १५ किमी अंतरावर ) हिंगलाज देवीचे स्थान डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे, अवघड वाटेने प्रवास करून इथे पोहोचता येते. त्याच्या बर्याच गुहा आहेत आणि एक नदीही वाहते. या स्थानावर हिंगलाज देवी एका ओबडधोबड खडकांच्या स्वरूपात स्थापित केली आहे. आता बलुचिस्तान ते छत्तीसगडला अशी हिंगलाज माता कशी काय प्रगट झाली आणि विशेष म्हणजे छत्तीसगडमधील लोकगीतांमध्ये ती कशी काय समाविष्ट झाली आणि इतर देवी देवतांसह तीची पूजा कशी सुरु झाली, हा संशोधनाचा विषय आहे.
साक्षी गोपाळ :-
शिवनारायण दर्शनानंतर राजीममध्ये जाउन "साक्षी गोपाळ"चे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. येथील दरवर्षी भरणार्या जत्रेला "छत्तीसगडचा कुंभ" म्हटले जाते, याच कारणाणे इथे धार्मिक पर्यटनामध्ये येणे आवश्यक मानले जाते.
शबरीचे खरे नाव श्रमण होते, ती भिल्ल समाजातील शबर जातीची होती. तीचे वडील भिल्लांचे राजा होते. असे म्हणतात की तिचे लग्न एका भिल्ल कुमार सोबत ठरले होते, लग्नाआधी शेकडो बकरे आणि म्हशी बळी देण्यासाठी आणल्या होत्या, हे पाहून शबरीला खूप वाईट वाटले की हे कसले लग्न आहे ज्यासाठी इतके प्राणी मारले जातील अशी तीची भावना झाली. 
लग्नाच्या एक दिवस आधी शबरी घरातून पळून गेली. घरातून पळून ती दंडकारण्याला पोहोचली. दंडकारण्यमध्ये मातंगां ऋषी तपश्चर्या करत असत, शबरीला त्यांची सेवा करायची होती परंतु ती खालच्या जातीची होती आणि तिला भिती वाटत होती की कोणीही ऋषी तिची सेवा स्वीकारणार नाही. यासाठी तिने एक मार्ग शोधला, पहाटे पहाटे ऋषींना जाग येण्यापूर्वी ती त्यांच्या आश्रमापासून नदीपर्यंतचा रस्ता साफ करायची, काटे गोळा करायची आणि वाटेत वाळू पसरायची. कोणाला समजणार नाही अशा पद्धतीने ती हे सर्व करत असे.

एके दिवशी ऋषी मातंगांची नजर शबरीवर पडली, तिच्या सेवाभावनेवर खूश होऊन त्यांनी शबरीला आपल्या आश्रमात आश्रय दिला, यामुळे ऋषींना लोकांकडून विरोध झाला पण तरीही त्यांनी शबरीलाच आपल्या आश्रमात ठेवले.मातंग ऋषींच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा त्यांनी शबरीला आपल्या आश्रमात रामाची वाट पाहण्यास सांगितले, तो तीला भेटायला नक्कीच येईल. मातंग ऋषींच्या मृत्यूनंतर, शबरी आपला वेळ भगवान रामाच्या प्रतीक्षेत घालवू लागली, तिने आपला आश्रम अतिशय स्वच्छ ठेवला. ती रोज रामासाठी गोड बोरे तोडायची. बोराच्या बीमध्ये कीड नाही आणि ते आंबट नाही याची खात्री करण्यासाठी तिने प्रत्येक बोर चाखून मगच ते गोळा केले. असे करता करता बरीच वर्षे गेली.
एके दिवशी शबरीला कळले की दोन तरुण तिचा शोध घेत आहेत. तिला समजले की हेच तिचे प्रभू राम आले आहेत, तोपर्यंत ती म्हातारी झाली होती आणि काठीचा आधार घेऊन चालत होती. पण रामच्या आगमनाची बातमी समजताच तीचे भान हरपून गेली, तिने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याना घरी आणले आणि त्याचे पाय धुवून त्याना आसनावर बसवले.

तीने जमवलेली गोड बोरं रामाला दिली. ती बोरे रामाने मोठ्या प्रेमाने खाल्ले आणि लक्ष्मणालाही खाण्यास सांगितले. लक्ष्मण उष्टी बोरे खाण्यात संकोच करत होता, म्हणून रामाचे मन राखण्यासाठी त्याने बोर उचलले पण खाल्ला नाही. त्यामुळे राम-रावण युद्धात जेव्हा शक्तीबाण वापरला गेला आणि तो लक्ष्मणाला लागला तेव्हा ते बेशुद्ध झाले, असे म्हणतात.
हे शहर सत्ययुगात बैकुंठपूर, त्रेतायुगात रामपूर, द्वापारयुगात विष्णुपुरी आणि नारायणपूर या नावांनी प्रसिद्ध होते, आज हा परिसर चित्रोत्पल-गंगा (महानदी) काठावरील कलिंग भूमीजवळ शिवनारायण या नावाने प्रसिद्ध आहे.येथे सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या अन्नपूर्णा मातेचे भव्य आणि आकर्षक मंदिर आहेच पण याशिवाय मोक्ष देणारे भगवान नारायण, लक्ष्मीनारायण, चंद्रचूड आणि महेश्वर महादेव, केशवनारायण, श्री राम लक्ष्मण जानकी, जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा, श्री जगदीश मंदिर, राधाकृष्ण, काली मंदिर आणि गायत्री माता अशी मंदीरे आहेत. एकंदरीत त्रिवेणी संगमावर वसलेले हे शहर मंदिरांचे शहर आहे. यासोबतच काही अंतरावर असलेल्या खरौडमध्येही प्राचीन मंदिरे आहेत.प्रथम हे शहर "शबर-नारायण" नंतर शबरी नारायण आणि आज शिवनारायण म्हणून ओळखले जाऊ लागले.
मधुबन धाम :-
छत्तीसगड प्रदेशात पिकाच्या कापणी आणि काढणीनंतर जत्रांचा कालावधी सुरू होतो. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर, शेतकरी जत्रा आणि सणांमध्ये स्वतःचे मनोरंजन करून येत्या कापणीच्या हंगामासाठी ताजेतवाने होतात. छत्तीसगडमध्ये तीर राजीम आणि महानदीमधील शिवरीनारायण यांसारख्या मोठ्या जत्रा भरतात आणि या जत्रा संपल्यानंतर इतर ठिकाणीही छोट्या जत्रा भरतात, या जत्रामध्ये ग्रामीण गरजेच्या वस्तूंची विक्री करण्याबरोबरच मेवामिठाईची खरेदी, स्नानसंध्या, कथा, प्रवचने ऐकण्याबरोबरच जत्रांमध्ये नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना भेटता येते आणि एकमेकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे जत्रा संस्कृतीची परंपरा पिढ्यानपिढ्या अखंड राहतो.
मधुबन धामचा Google नकाशा
काही ठिकाणी जत्रा तिथीप्रमाणे स्वयंस्फुर्त होतात तर काही ठिकाणी गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे लहान प्रमाणातील जत्रा विस्तारीत होऊन मोठ्या होतात. असेच एक ठिकाण म्हणजे छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील कुरुड तालुक्यातील रंकाडीह गाव. या गावात दिही नाही त्यामुळे या गावाचे नाव रंकाडीह पडले आहे.फाल्गुन शुक्ल पक्षातील तृतीयेपासून एकादशीपर्यंत येथे मधुबन जत्रा भरते जी मागील ३५ वर्षे सुरु आहे. मधुबन धाम रायपूरपासून नवापारा राजीम मार्गे ६१ किलोमीटर आणि रायपूरपासून कुरुड मेघा मार्गे ६९ किलोमीटर अंतरावर आहे

मधुबन धामचा रस्ता आणि ओढा
मधुबन सुमारे २० हेक्टर जमिनीवर पसरले आहे. या ठिकाणी मोहाची झाडे मुबलक असल्याने मधुक जंगलावरून मधुबन हे नाव पडले असावे. हे ठिकाण राजीमच्या आधी महानदी आणि पॅरी सोंधूर नद्यांच्या मध्यभागी वसलेले आहे. राजीम कुंभ स्थळावरून नयापारा, भेंद्री, बडी कारली मार्गे मधुबन धामला पोहोचलो. येथे छत्तीसगड सरकारने जत्रेदरम्यान भाविकाच्या निवासासाठी भक्तनिवास नावाचे विश्रामगृह बांधले आहे.
संत निवास मधुबन धाम
या जत्रेची कथा अशी खैरझिटी नाल्याच्या पलीकडे गावात संत चरणदास महंत नावाचे गृहस्थ राहत होते. ते तपस्वी आणि योगी होते. त्यांना वाटले की येथे मंदिर असावे. रंकाडीह येथे त्यांनी जमीन मागितली, मात्र त्यांना नकार मिळाला. निराश होउन ते आपल्या घरी परत आले. एक दिचस त्यांच्या पत्नीने तांदुळ धुवून सुकत घातला मात्र एक गाय येउन तो खाउ लागली. ते पाहून हि महंत काही बोलले नाहीत, यावर त्यांच्या पत्नीला राग आला आणि ती महंताना अद्वातद्वा बोलू लागली. त्यावर महंत म्हणाले- मी उद्या रात्री बारा वाजता निजधामाला जाईन, त्याप्रमाणे खरोखरच महंताचा रात्री बारा वाजता मृत्यु झाला.

मधुबन धामचे मोहाचे वृक्ष
पूर्वी इथे घनदाट जंगल होते आणि जंगल इतके घनदाट होते की झाडांमधून दोन बैल एकत्र जाऊ शकत नव्हते. महंत गेल्यावर काही लोकांना इथे लाल चेहऱ्याचे मोठे माकड दिसले. तो माणसासारखा दोन पायांवर उभा असल्याचे दिसले. पाहणाऱ्यांना प्रथम ते रामलीलाच्या वेशभूषेतले माकड वाटले, पण ते खरे माकड होते. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी या घटनेची चर्चा केली. संत बृजमोहन दास अयोध्येहून खैरझिटी गावात आले. त्यांनी येथे यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वांनी जाऊन रंकाडीहच्या गौंटीयाला यज्ञात सहकार्य करण्याची विनंती केली, पण पूर्वीप्रमाणेच त्यांनी नकार दिला. पण गावकर्यानी आग्रह धरला आणि 9 दिवस चाललेला यज्ञ येथे पार पडला. तेव्हापासून येथे दरवर्षी यज्ञासह जत्रेचे आयोजन केले जाते.
मधुबन धाममधील विविध समाजाची मंदिरे
रंकाडीहच्या जत्रेत खैरझिटी, अरौड, गिरौड, कमरौड, संकरा, भोटीडीह, रंकाडीह, चारभाटा, कुंडेल, मतीनपूर, बेलाउडी या ११ गावांतील रहिवासी सहभागी होतात. जत्रेत विविध संस्थांच्या संस्थांनी खाजगी मंदिरे उभारली आहेत. साइट आणि धर्मशाळा, साहू समाजाचे कर्म मंदिर, देश सेन समाजाचे गणेश मंदिर, निषाद समाज बांधले. आदिवासी गोंड समाजाचे राम जानकी मंदिर, आदिवासी गोंड समाजाचे दुर्गा मंदिर, निर्मळकर धोबी समाजाचे शिव मंदिर, झेरिया यादव समाजाचे राधाकृष्ण मंदिर, कोसारिया यादव समाजाचे राधाकृष्ण मंदिर, लोहार समाजाचे विश्वकर्मा मंदिर, कांद्रा समाजाचे रामदरबार मंदिर, रायदास मंदिर. मोची समाजाचे कबीर मंदिर, गायत्री परिवाराचे गायत्री मंदिर, कंवर समाजाचे रामजानकी मंदिर, मधुबन धाम कमिटी संचालित उमा महेश्वर आणि हनुमान मंदिर, लक्ष्मीनारायण साहू बेलौडी यांनी बांधलेले रामजानकी मंदिर, स्वर्गीय मस्त राम साहू यांनी बांधलेले हनुमान मंदिर स्थापित केले आहे.

भगवान श्रीकृष्ण सरोवरात असलेला कालियामर्दन स्थितीतील पुतळा
मधुबनमध्ये जत्रा आयोजित करण्यासाठी मधुबन धाम समितीची स्थापना करण्यात आली आहे, ही समिती विविध उत्सवांचे आयोजन करते. फाल्गुन जत्रेसोबतच चैत नवरात्री आणि क्वार नवरात्री हे नऊ दिवसांचे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात आणि दिवाळीनंतर राज्यस्तरीय सांस्कृतिक मातर उत्सव साजरा केला जातो, ज्याला जत्रेसारखेच वैभव आहे. जसजशी चर्चा पुढे सरकत जाते तसतसे बोधन सिंह सांगतात की - मधुबन हे पांडवकालीन मानले जाते, पाच पांडवांपैकी राजा सहदेव कुंडेल गावात राहतो आणि त्याची राणी सहदेई बेलौडी या गावात राहते, इथून काही अंतरावर मोहाची ७ झाडे आहेत. , ज्याला पाचपेडी म्हणतात. या झाडांना राजा-राणीच्या लग्नाच्या निमित्ताने आलेल्या बजानिया (बाजवाला) म्हणतात आणि मधुबनातील सर्व मोहाची झाडे त्यांच्या लग्नाची मिरवणूक मानली जातात.
हनुमान मंदिर आणि यज्ञशाळा
लंका जिंकण्यासाठी भगवान राम याच मार्गावरून गेले होते, अशीही एक मान्यता आहे. राम वन गमनाच्या मार्गात हे स्थान महत्त्वाचे मानले जाते. सध्या या ठिकाणी शासकीय निधीतून संत निवासाचे बांधकाम शक्य झाले. मधुबनजवळील नाल्यावर आठवडी बाजार भरतो. रस्त्याच्या एका बाजूला भाजीपाल्याची दुकाने तर दुसऱ्या बाजूला मासळीची दुकाने आहेत. जत्रेच्या दिवसांमध्ये येथे मांस, मासे, अंडी, दारू इत्यादींची विक्री आणि सेवन करण्यास सक्त मनाई आहे. हा नियम सर्व ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी कोणी हे सेवन केल्यास त्याला बजरंग बळीच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि त्या विक्रेत्याला पोलिस पकडतात. आजूबाजूची सर्व गावे साहूबहुल आहेत, गावांच्या एकूण लोकसंख्येमध्ये तेली जातीचा वाटा ७५% आहे.
कांगेर खोऱ्याचे अरण्यवैभव :-
बस्तरमधले मिश्र पानझडी प्रकारचे वन आहे. कांगेर खोरे हे ओदिशा आणि छत्तीसगढच्या सीमेलगत, जगदालपूरपासून २७ किमी अंतरावर स्थित आहे. साधारण ३०० ते ७०० मीटर उंचीच्या टेकड्यांनी वेढलेल्या या भागात विपुल वनसंपदा आहे. मध्य भारतातली शुष्क पानझडी वने आणि पूर्व भारतातली साग-साल वृक्षांनी नटलेली दमट पानझडी वने यांच्या मध्यभागात हे वन असल्याने येथे दोन्ही प्रकारची जैवविविधता आढळते. खरे तर भारतातल्या काही अस्पर्शित राहिलेल्या वनांपैकी हे एक वन मानले जाते. तीरथगढ धबधब्यासोबत इथल्या चुनखडकातल्या नैसर्गिक गुहा हे एक मुख्य आकर्षण आहे.
 |
रानातले एकलकोंडे वठलेले झाड
|
 |
| भातशेतीच्या कडेने ट्रेकला सुरुवात |
 |
| रानाच्या मध्यातला डोह |
 |
| गर्द वनराईतून खळाळत जाणारा ओढा |
या जंगलात जायचे तर साधारण ८-१० किमीचा रस्ता आहे. भातशेतीच्या कडेकडेने हा रस्ता धावू लागतो. बाजूने एक ओहोळ सोबत असतो. हळूहळू शेती मागे पडते आणि आपण दाट रानात शिरतो. एव्हाना इवलासा वाटणारा तो ओहोळ आता एका खोडकर ओढ्यात रुपांतरीत झाला होतो. हा ओढा वाट्टेल तसा खडकांना कापत नि धरणीला चिरत गर्द झाडीतून सुसाट वाहत असतो. आपली सारी भ्रमंती आता याच्याच साथीने होते. वाट उताराची आहे. थोड्या वेळातच पाण्याचा आवाज वाढतो. काही पावलं पुढे गेलो कि गर्द रानाच्या मधोमध एक निळा-सावळा डोह दिसतो. आजूबाजूच्या खडकांवरून ओढ्याचे पाणी उड्या घेत वाहते. काठाने वाढलेले प्रचंड वृक्ष आपल्या दाट पर्णसंभाराचे छत्र त्या डोहावर अलगद धरून उभे असतात.
 |
अरुंद घळीतला जोमात वाहणारा ओढा
|
पुढची वाट काहीशी सपाट आहे. याच ओढ्याच्या कधी त्याच्या काठाने, कधी त्याला पार करत, कधी वर चढत, तर खाली उतरत आम्ही पुढे चालतो. झाडांच्या पर्णसंभाराची गडद हिरवी छटा तर मधेच दिसणारी बांबूची बेटे पानझडी वनांचा आभास निर्माण करतात. मधेच जमिनीचे काही सपाट तुकडे भाताच्या रोपांनी भरलेले दिसतात. आता ओढ्याचे पात्र जरा मोठे झाल्यासारखे वाटते. एका ठिकाणी पाणी दहा-बारा फुटांवरून खाली कोसळते. जणू एक लहानसा धबधबाच! तिथे दगडांची रचना मस्त बैठक मारून बसायला अगदी अनुकूल आहे.पुढे अचानक तीव्र उतार सुरु होतो.पुढे एक अरुंद घळीत आपण येऊन पोहोचतो. ओढ्याचे पाणी इथून भरधाव वेगाने वाहते. त्याचा आवाज सर्वत्र घुमतो. पुढे आपण तीरथगड धबधब्याच्या वाहनतळाजवळ येउन पोहच्तो.
 |
ओढ्याचे काहीसे शांत रूप
|
कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानात तशा बघण्यासारख्या अजून अनेक जागा आहेत. पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या नैसर्गिक गुहा त्यांपैकीच एक. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तिथे पाणी असल्याने जाणे शक्य नव्हते. त्याव्यतिरिक्त काही दुर्गम भागात जाणारे ट्रेक मार्गही आहेत.
नैसर्गिक आश्चर्य जलजली (दलदली) मेनपाट :-
अंबिकापूर राजधानी रायपूरपासून ३५२ किलोमीटर अंतरावर आहे आणि छत्तीसगडचे शिमला अंबिकापूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळच निर्वासित तिबेटी लोकांचे आश्रयस्थान मैनपट वसलेले आहे. मैनपटच्या कमलेश्वरपूर या गावाभोवती निर्वासित तिबेटी लोकांच्या छावण्या आहेत. येथील पर्यटन विभागाच्या शैला रिसॉर्टपासून तीन किलोमीटर अंतरावर जलजली (दलदली) नदी आहे.
या नदीच्या काठावर सुमारे ३ एकर क्षेत्रफळ असे आहे की त्यावर उडी मारल्यास ती हादरते. त्याला जंपिंग लँड असेही म्हणता येईल. जेव्हा कोणी या जमिनीवर उडी मारते तेव्हा ती स्पंज बॉलप्रमाणे आकसते. इथे आल्यानंतर लोक मुलांप्रमाणे उड्या मारून त्याची खात्री करतात.
मेनपट जलजली
बाहेरील जगातील लोकांना या जागेचे हे वैशिष्ट्य फारसे परिचित नाही. तरीही निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी काही पर्यटक रोज येतात.जगात कुठेही पृथ्वी हादरते तेव्हा अगदी थोड्या हादर्यामुळे मोठे नुकसानही होते. हा एकच भूकंप आहे ज्याचा आनंद घेण्यासाठी लोक लांबून येतात आणि निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार बघून थक्क होतात. या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर एक धबधबा आहे पण तो जंगल परिसर असल्याने तिथे जाण्यासाठी रस्ता नाही.
मेनपट जलजली ( पाणथळ जमीन)
हे ठिकाण देशातील जमीन निर्मिती प्रक्रियेचे पहिले उदाहरण आहे. जेव्हा पृथ्वीवर फक्त पाणी होते आणि त्यानंतर हळूहळू वनस्पती पाण्यात जमा होऊ लागली आणि पाण्याचे दलदलीत रूपांतर होऊन जमीन घनरूप होऊ लागले. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर पाणथळ जमिनीचे स्थिर जमीनीत रूपांतर झाले. पाणथळ जमीनीची स्थिर जमीन होण्याची ही प्रक्रिया आजही येथे सुरू आहे. शेकडो वर्षांनी कदाचित ही जमीनही पक्की होईल.
मेनपट जलजली ( पाणथळ जमीन)
या पाणथळ जमिनीखालून एक नदी वाहते. वनस्पतींनी या जमिनीला इतके घट्ट धरुन ठेवले आहे की ती अस्थिर होत नाही आणि उडी मारल्यावर ती नेहमी त्याच प्रकारे आकसली जाते. नदीच्या पाण्याच्या वर मातीचा आणि झाडांचा सुमारे ४-५ मीटर जाडीचा थर आहे, दगडांनी भरलेली ट्रॉली सहीत ट्रॅक्टर या जमीनीवरुन गेला तरी एवढ्या वजनानंतरही तडे जात नाहीत आणि त्याची चाकेही रुतत नाहीत ना त्यात ट्रॅक्टर बुडतो. निसर्गाचा हा चमत्कार मेनपटमध्ये दिसतो इतरत्र कुठेही नाही.
कलचुरीकालीन मोंहदीगड :-
अनेक अभ्यासकांचे मते कलचुरी मध्ययुगीन काळात छत्तीसगडमध्ये निर्मिती झाली. कलचुरी राजवटीत हे किल्ले प्रशासनाचा महत्त्वाचा घटक होते.पुढे कालचुरी राजवटीचे दोन शाखांमध्ये विभाजन होउन त्यामध्ये शिवनाथ नदीच्या उत्तरेला रतनपूर शाखा आणि दक्षिणेला रायपूर शाखा निर्माण झाली.
मोहंदीगडच्या पठाराकडे जाणार्या पायर्या
कलचुरीच्या दोन शाखांनी पुढील प्रमाणे गड उभे केले
हे किल्ले पुढीलप्रमाणे - रतनपूर शाखेने उभारलेले १८ किल्ले : रतनपूर, उपोरा, मारो, विजयपूर, खरौड, कोटगड, नवगढ, सोढी, ओखर, पदरभट्टा, सेमरिया, मदनपूर, कोसगाई, करकट्टी, लाफा, केंडा, मतीन, पेंद्र आणि
रायपूर शाखेने उभारलेले १८ किल्ले गड: रायपूर, पाटण, सिमगा, सिंगारपूर, लावण, आमेरा, दुर्ग, शारदा, सिरसा, मोहदी, खल्लारी, सिरपूर, फिंगेश्वर, सुवर्मल, राजीम, सिंगारगढ, तेनागढ, अकलवाडा.
मोहंदीगड पठार
पुढे कालौघात कलचुरी राज्य मोडकळीस आले. रायपूर शाखेचे शेवटचे शासक अमरसिंग यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी त्यांचा मुलगा शिवराज सिंह याला पाच गावे (बारगाव, मुधेना, भालेसर, गोईंदा, नांदगाव) कर्जमाफी देऊन आणि प्रत्येक गावातून एक रुपया भरपाई देऊन त्यांचे हक्क संपवले. सध्या या कालाचुरींचे वंशज महासमुंद जिल्ह्यातील या पाच गावांमध्ये राहतात.
मोहंदीगडची लेणी
रायपूर शाखेच्या अठरा किल्ल्यांपैकी एक असलेल्या मोहादीगड खल्लारी रस्त्यावर महासमुंदपासून १२ किमी अंतरावर मोहाडी नावाच्या गावाच्या डुंगरीवर आहे. येथे गधेन माईचे (चंपाई माता) स्थान आहे. आजूबाजूचे गावकरी तिला आराध्य देवता मानतात आणि तिची पूजा करतात. डुंगरीच्या माथ्यावर पधार आहे, त्याला लागूनच आमली पठार आहे आणि माथ्यावरून बेलेर गावाकडे जाणारी वाटही आहे. सध्याच्या बांधकामांव्यतिरिक्त इतर प्राचीन बांधकामांचे अवशेष येथे दिसत नाहीत. पण डुंगरीमध्ये बोगदे आणि गुहा असल्याची कथा ऐकायला मिळते. गुहेसारख्या बोगद्यात चंपाई माता विराजमान आहे. खडबडीत दगडाच्या दोन मूर्ती आहेत ज्यात डोळे जडवलेले आहेत. नवरात्रीनिमित्त येथे दीप प्रज्वलीत केले जातात आणि जत्राही भरते.
इथून पठारावर चालत गेल्यावर बालेर गावाच्या वाटेवर मानवनिर्मित दगडी भिंती दिसते. येथे स्थानिक देवतेचे स्थान आहे. याशिवाय दुसरे काही दिसत नाही. येथे अधिक संशोधनासाठी डुंगरी प्रत्येक कानाकोपऱ्यातून शोध घ्यावा लागेल. इथे प्राचीन मानवी वस्तीच्या खुणा सापडण्याची शक्यता आहे. डुंगरीवरून उतरल्यावर एक फर्लांग अंतरावर दहा ते पंधरा घरांचे दगडी पाया दिसतात, त्यावरून असे दिसते की येथे कधी काळी मानवी वस्ती होती. येथे एक प्राचीन विहीर देखील आहे.
चंपाई माता मोहंदीगड
मोहाडी नावाची अनेक गावे छत्तीसगडमध्ये असली तरी भौगोलिक दृष्ट्या ठिकाण मोहाडीगडच असावे असे वाटते. कारण खल्लारी, सुरमळ, फिंगेश्वर, सिरपूर इत्यादी किल्ले जवळच आहेत.
जटमाईतील नैसर्गिक सौंदर्य :-
छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातील चुरा भागातमध्ये जटमाई नावाचा नैसर्गिक धबधबा आहे. हिरवाईने नटलेल्या डोंगरावरून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. रायपूरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असल्याने शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील पर्यटक वीकेंडला येथे येतात आणि जटमाई मातेच्या दर्शनाबरोबरच धबधब्याची मजाही लुटतात. रविवारी येथे खूप वर्दळ असते. या ठिकाणी जंगलातील रमणीय वातावरणाचा आनंद लुटता येतो. जंगलामध्ये नैसर्गिक धबधबा असल्याने काही वर्षांपासून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात, यासोबतच वनदेवी जटमाईच्या दर्शनासाठीही मोठ्या संख्येने लोक येतात. वास्तविक, जटमाईचा धबधबा पावसाळा जुलै ते डिसेंबरपर्यंतच असतो. नववर्षाच्या दिवशी पिकनिकर्सची मोठी गर्दी असते.



ही जागा पटवा गावाजवळ आहे. येथे स्थानिक लोक समिती स्थापन करून या जागेचा विकास करत आहेत. हा धबधबा ७० फूट उंचीवरून कोसळतो. येथे मोठमोठे खडक एकावर एक अशा प्रकारे ठेवले आहेत की जणू काही कुशल कारागिराने ते बसवले आहेत. जाटमाई मंदिराजवळ सिद्धबाबांचे प्राचीन स्थान आहे, येथे चिमटा ठेवला आहे. ४०० वर्षांपूर्वी या ठिकाणी एका सिद्धबाबाचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. त्याच्यामुळे हे ठिकाण अधिक ओळखले जाऊ लागले.
येथे एक सिंहाचा गुहा देखील आहे, ज्याला स्थानिक लोक शेरगुफा म्हणतात. पूर्वी या ठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणात होते. अस्वलांचे अस्तित्व अजूनही आहे. दुदैवाने पर्यटकांच्या बेताल वावरामुळे या ठिकाणी प्लास्टिकचे बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर आणि पर्यटकांकडून पसरलेली घाण यामुळे या ठिकाणी प्रदूषण वाढत आहे. येथे प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली पाहिजे.
चितल हरण - बार नवापारा अभयारण्य छत्तीसगड : -
या अभयारण्यात बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तृणभक्षी प्राणी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पाणी पिण्यासाठी पाण्याच्या साठ्यावर येतात.
चितळ हरणांसाठी प्रसिध्द असलेले बार नवापारा अभयारण्य कलकत्ता मार्गावर रायपूरपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. पिठोरामार्गे येथे जाता येते व बालोदाबाजार येथूनही जाता येते. बार नवापारा व्यतिरिक्त, चितळे श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि बांगलादेशातही आढळतात.
छत्तीसगडचे मॉरिशस बुका :-
राजधानी रायपूरपासून २३० किलोमीटर अंतरावर कटघोरामार्गे गेल्यास मडई गावापासून ५ किलोमीटर अंतरावर हसदेव बांगो धरणाच्या बॅकवॉटर परिसरात विकसित करण्यात आलेल्या बुका या पर्यटन केंद्रात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. वनविभागाने येथे पर्यटकांसाठी कॉटेज बांधले आहेत. पैसे भरल्यानंतर तुम्ही इथे राहू शकता.
छत्तीसगडमध्ये समुद्र नसला तरी ज्यांना 'सी बीच'ला भेट द्यायची आहे आणि बोटिंगला जायचे आहे त्यांनी निराश होण्याची गरज नाही. शहरांच्या गजबजाटापासून दूर, हे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले एक ठिकाण आहे, जिथे उन्हाळ्यातही सुख आणि मनाला समाधान मिळते. येथे ४००-४५० फूट खोल पाणी आहे. हिरवीगार जंगले आणि पर्वतांच्या मधोमध असलेल्या या तलावाचे निळे पाणी मन मोहून टाकते.
सरोवराच्या मधोमध नैसर्गिक बेटामुळे आणि त्यावर उभ्या असलेल्या झाडांच्या हिरवाईमुळे याला छत्तीसगडचे मॉरिशस असे संबोधले जाते. काटघोराजवळील 'बुका' या जलाशयाचे सौंदर्य अनोखे आहे. डोंगरांनी वेढलेल्या बुकाच्या खोल पाण्यात वसलेल्या तेहरीसरायच्या मध्यभागी एका खडकात गणेशाचे स्वरूप नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.
सूर्योदयाच्या वेळी काचेच्या घरातून आकाशात उगवणाऱ्या सूर्याचे दृश्य अविस्मरनीय असते. ऋतूनुसार पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आकाशाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. उन्हाळ्यात बुका येथे सकाळ संध्याकाळ पोहण्याचा आणि नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी लांबून लोक येतात. बोटीने केलेल्या १६ किमीच्या प्रवासात अनेक छोटी बेटे असून साल, साग, खैर आदी वृक्ष बघायला मिळतात.
थकवा दूर करण्यासाठी तंबू, विश्रामगृह आणि काचेची घरे आहेत, जिथे सौरऊर्जा आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. बुका हे राज्यातील बहुधा पहिले पर्यटन स्थळ आहे, जिथे प्रवास बोटीने केला जातो. बुका ते बांगो धरण हे अंतर २५ किमी आहे. बुका येथून बोटीने दोन तासात तेथे पोहोचता येते. त्याचप्रमाणे दीड तासात सत्रेंगा, एक तासात गोल्डन आयलंड आणि केंदाई वॉटर फॉल्स, मंजूरखोर आदी पर्यटनस्थळांवर पोहोचता येते.
दमऊ दहरा :-
छत्तीसगडमध्ये पूर्वेला ओरिसा ते अमरकंटकपर्यंत पसरलेले पर्यंत पसरलेल्या मैकल पर्वतरांग आहे , हि एकप्रकारे निसर्गाने दिलेली देणगी आहे. येथील नयनरम्य दऱ्यांची चर्चा पुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये आढळते, त्यानुसार येथील नद्या गंगेसारख्या पवित्र आणि मोक्ष देणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे डोंगरावरील हिरवाई आणि नयनरम्य दृश्य यामुळे इथे देवी-देवतांना वास असावा अशी भावना होते. या देवांचे दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले असावे. या जंगलात आणि पर्वतांमध्ये अजूनही गुहा पाहायला मिळतात, ज्या त्या काळातील ऋषीमुनींची आठवण करून देतात.
मात्र मैकल पर्वतरांगेच्या गर्भात भुशास्त्रज्ञांना बॉक्साईट, कोळसा, चुना आणि हिऱ्याचे साठे सापडले आहेत. त्यामुळेच हा परिसर औद्योगिक नकाशावर आला आहे. कोरबा, बाल्को आणि भिलाई ही छत्तीसगडमधील प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. एवढेच नाही तर कोरबा आणि चिरमिरी येथे कोळशाच्या मोठ्या खाणी आहेत. याशिवाय अनेक स्टील प्लांट आणि सिमेंट कारखाने येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे उत्खनन करून निसर्गाला हानी पोहचवत आहेत. छत्तीसगडचे शांत वातावरण वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषित होत आहे.
'दमाऊ दहरा' हा मैकल पर्वतरांगाचा एक भाग आहे जिथे निसर्गाच्या अनोख्या छटा बघायला मिळतात. दमाऊ दाहरा हे छत्तीसगडचे तत्कालीन सर्वात लहान संस्थान आहे. दमौ दहराचे प्राचीन नाव 'गुंजी' आहे. छत्तीसगड पुरातत्वशास्त्रज्ञ आणि साहित्यिक पंडित लोचनप्रसाद पांडे यांच्या प्रयत्नांमुळे याला ऋषभतीर्थ हे नाव पडले. हे गाव प्राचीन काळातील प्रगत सांस्कृतिक ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या टेकडीवर ऋषीना राहण्यासाठी गुहा आहेत .दहराजवळच्या टेकडीवर एक शिलालेख कोरलेला आहे जो सातवाहन काळातील आहे. त्या काळातील इतर शिलालेख कोरबा आणि अडभर येथेही आहेत. या भागात रामायण काळातील अनेक अवशेष सापडतात, ज्यावरून असे दिसते की श्री रामचंद्रजी त्यांच्या वनवासाच्या काळात येथे आले असावेत. ऋषभतीर्थापासून तीन मैलांवर उत्तर दिशेला आश्रम आहे. जटायू आश्रम त्याच्या ईशान्येला आहे. त्यामुळे या पर्वताला ‘गिधवार पर्वत’ म्हणतात. आग्नेय दिशेला राम झारोखा, राम शिला, लक्ष्मण शिला आहे. वायव्य दिशेला अर्ध्या मैलाच्या अंतरावर उमा महेश्वर आणि कुंभज ऋषींचा आश्रम आहे. त्यामुळे येथील डोंगराला 'कुम्हारा पहाड' म्हणतात. पश्चिमेला तीन मैल अंतरावर 'सीता खोलिया' आणि दहा मैल अंतरावर शूर्पणखाचे स्थळ आहे. त्याच्या जवळच कबंध राक्षस (कोरबा) आणि खरदुषण (खरौड) शहर आहे. पश्चिम दिशेला अर्ध्या मैल अंतरावर 'मारीच खोल' आहे. येथेच रावणाने मारीचसह सीतेच्या अपहरणाचा कट रचला होता, असे मानले जाते. या जागेला रंखोल म्हणतात. तसेच छत्तीसगडमध्ये रामायण काळातील अनेक अवशेष सापडतात. यावरून या परिसराच्या प्राचीनतेची जाणीव होते.

हे जंजगीर-चंपा जिल्ह्यांतर्गत, दक्षिण पूर्व रेल्वेच्या सक्ती स्टेशनपासून १५ किमी अंतरावर, कोरबा औद्योगिक शहरापासून ३५ किमी अंतरावर आहे. अंतरावर आहे. येथे बस, जीप आणि कारने जाता येते. येथे राहण्यासाठी धर्मशाळाही आहे. सक्ती, चंपा आणि कोरबा येथे विश्रामगृहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्रामगृहे आहेत जिथे कोणी राहू शकते. सप्टेंबर-ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत येथील हवामान चांगले असते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी पर्यटकांची चांगलीच गर्दी असते.

इथे डोंगरांनी वेढलेला एक खोल तलाव आहे ज्यामध्ये डोंगरातून सतत पाणी पडत असते. स्थानिक भाषेत खोल तलावाला 'दहरा' म्हणतात. शक्ती राज्याचा संस्थापक राजा या दहराला येत असे असे मानले जाते. डोंगरातून वाहणारे पाणी या तलावात येत असल्यामुळे दहराचे पाणी काहीसे खारट आहे . हे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
उदांती अभयारण्य :-
छत्तीसगड - ओरिसाला लागून असलेल्या रायपूर-देवभोग मार्गावरील २०.१५ उत्तर अक्षांश आणि ८२.० रेखांशावर असलेल्या या अभयारण्याची स्थापना १९८४ मध्ये करण्यात आली. याचे क्षेत्रफळ २३७.२८ चौरस किमी आहे. इथले तापमान किमान ७ सेल्सिअस आहे. आणि जास्तीत जास्त ४० सें.मी. राहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या उदांती नदीवरून या अभयारण्याला नाव देण्यात आले आहे. या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या असंख्य टेकड्या आणि त्यांच्यामध्ये पसरलेली मैदाने उदांतीच्या टेकड्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या आहेत. या जंगलांमध्ये आवळा, सागवान, अर्जुन, अमलताश या प्रजातींची झाडे आढळतात.जंगलाची जमिन गवत, झाडे, झुडपे यांनी व्यापलेली आहे. अभयारण्याचा उत्तर-पश्चिम भाग सालच्या झाडांनी व्यापलेला आहे.
फेब्रुवारी महिन्यात उदांती नदीचा प्रवाह थांबतो. प्रवाह थांबला की नदीच्या पात्रात शांत पाण्याचे तलाव तयार होतात. येथे काही धबधबे देखील आहेत, ज्यात प्रसिद्ध देवधारा आणि गोडीन धबधबा यांचा समावेश आहे. अभयारण्याच्या बहुतांश भागात पुरेशा प्रमाणात मानवनिर्मित जलसाठे आहेत. यामध्ये कॅम्प क्र. 34 जलाशय,कॅम्प क्र. ८२, जलाशयाभोवती वर्तुळाकार रस्ता असणारा कॅम्प क्र ८१ जलाशय आणि कॉम्प क्र. ७७ जलाशयांचा समावेश आहे. इथे जंगली म्हशी बघायला मिळतात. १२० हून अधिक प्रजातींचे पक्षी उदांतीमध्ये आढळतात, ज्यामध्ये अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. यापैकी काही जंगली कोंबडे, तीतर, बुलबुल ड्रोंगो, सुतार इ. आहेत. वन्य प्राण्यांमध्ये चितळ, सांभर नीलगाय, रानडुक्कर आणि कोल्हा इथे सहज दिसतात. बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रा, जंगली मांजर, सांळीदर, पट्टेदार तरस, गवे, चौसिंगा आणि हरणेही आढळतात. वाघ मोठ्या संख्येने असले तरी त्यांच्या लाजाळू स्वभावामुळे ते क्वचितच दिसतात. उदंती हे अशी जागा आहे जिथे सर्वात मोठ्या सस्तन प्राण्यांपैकी एक, जंगली म्हैस आणि गवे एकत्र दिसतात. या अभयारण्याच्या निर्मितीचे विशिष्ट कारण म्हणजे लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे येथे असलेले अस्तित्व आहे, जंगली म्हशी जी फक्त आसाम आणि छत्तीसगड राज्यात आढळतात.
निसर्गरम्य ठिकाणे
गोदेना धबधबा :-
छत्तीसगड राज्याचे नाव बदलून गोंडवाना राज्य करण्याची मागणी गोंडवाना समाज अनेक दिवसांपासून करत आहे. छत्तीसगडचे नाव गोंडवाना होइल की नाही हे येणारा काळच सांगेल, पण छत्तीसगडमध्ये एक सुंदर धबधबा नक्कीच आहे ज्याचे नाव 'गोडेना फॉल' आहे. गोडेना धबधबा छत्तीसगड राज्याच्या ओरिसा सीमेवर वसलेला आहे. रायपूरपासून ते १८० किलोमीटर अंतरावर आहे. राजीम, गरिआबंद मैनपूर मार्गे या ठिकाणी पोहोचता येते. तरेंगा हे मैनपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर वसले असून तेथे वनविभागाचे विश्रामगृह आहे. तोरंगेपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाम्हणीढोला येथे वनविभागाने चेकपोस्ट बसवले आहेत. येथे १५ रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरून प्रवेश घेता येतो. वाहन प्रवेशासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागते. बाम्हणी ढोला येथे कार्लाझार येथे वनविभागाचे विश्रामगृहही आहे.
कार्लाझार गावापासून ८ किमी अंतरावर आहे. अंतरावर स्थित आहे. या संपूर्ण क्षेत्राला उदांती म्हणतात, हे अभयारण्य उदांती नदीच्या परिसरात २३७ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. अभयारण्याच्या मधोमध उदांती नदी वाहते. उदांती नदीवरच 'गोडेना फॉल' आहे.

ग्रॅनाइट आणि संगमरवरी खडकांमधून वाहणारी उदांती नदीचा प्रवाह दरीत झेप घेतो जिथे गोडेना फॉल्स आहे. रंगीबेरंगी रंगाच्या खडकांमधून पडणारे पाणी धबधब्याचे सौंदर्य वाढवते. हे मौल्यवान खडक पाहून कदाचित या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगड आणि छत्तीसगडच्या जनतेला 'श्रीमंत भूमीचे गरीब लोक' म्हटले असेल. येथे फिरताना, आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे कि हा परिसर मौल्यवान रत्ने आणि हिर्याच्या खाणीच्या अगदी जवळ आहात. गोदेना फॉल्सला जाताना तुम्ही उदांती अभयारण्याला भेट देण्याचा आनंदही घेऊ शकता. हे अभयारण्य वन्य म्हशींच्या मूळ जातीसाठी संरक्षित आहे. साजा, साल, सागवान, हलडू इत्यादी वृक्षांनी भरलेले हे घनदाट जंगलाचे अभयारण्य आहे. चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर इ. येथे आढळतात. अभयारण्यातून परतताना 'दहीमान' नावाचे झाड पाहणे फारच कुतूहल वाटते. असे म्हणतात की या झाडाखाली बसल्याने आजारी व्यक्ती निरोगी होते. जनावरे आजारी पडल्यावर या झाडाखाली आसरा घेतात. जखमी प्राणी या झाडाच्या सालाने त्यांच्या जखमा भरतात. हे निसर्गाचे सद्गुण रूप दाखवते.

देवधरा धबधबा :–
तौरंगापासून १७ किमी. च्या अंतरावर हा धबधबा आहे. येथे पोहोचण्यासाठी १.५ किमी. चालावे लागते. दाट जंगलांनी वेढलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. प्रचंड खडकाच्या पूर्ण धूप झाल्यामुळे खडकांच्या खालून पाण्याचा प्रवाह जातो. ४० फूट उंचीवरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह आणि मागे नदीत असलेले पाणी हे विलक्षण दृष्य आहे.
सिकसेर जलाशय -
इथे जाण्यासाठी रायपूर देवभोग राज्य मार्गावरील धवलपूरच्या आधी ३ किमी. प्रथम डावीकडे वळण घेउन १६ किमी अंतरावर सिकसार तलाव आहे जो पॅरी नदीवर बांधला आहे, जिथे वरच्या आणि खालच्या बाजुला दोन्हीकडे सुंदर मंदिरे आहेत. डोंगराच्या माथ्यावर एक अतिशय सुंदर नैसर्गिक तलाव आहे जिथे दरवर्षी जत्रा भरते. या जलाशयावर जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. जलाशयाच्या खाली सुमारे ७०० मीटरपर्यंत नैसर्गिक उतार असलेल्या खडकांमधून सतत वाहणारा प्रवाह अतिशय सुंदर दिसतो. अनेक ठिकाणी खडकांमधील साचलेल्या पाण्यामुळे नैसर्गिक जलतरण तलाव बनतात.
सीतानदी अभयारण्य :-
सीतानदी अभयारण्याची स्थापना १९७४ मध्ये झाली आणि त्याचे क्षेत्रफळ ५५३.३६ चौरस किमी आहे. येथील वैशिष्ट्यांमध्ये १६०० मिमी वार्षिक पर्जन्यमान, किमान तापमान ८,५ सेल्सीयस. आणि जास्तीत जास्त ४४.५ सेल्सीयस या दरम्यान असते. अभयारण्यातून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या सीता नदीच्या नावावरून या अभयारण्याला सीता नदी असे नाव देण्यात आले. सीतानदीची जमीन खडबडीत आणि लहान टेकड्या आणि साल जंगलांनी व्यापलेली आहे. येथील सालचे जंगल हे देशातील सर्वोत्तम जंगलांपैकी एक आहे. अभयारण्यात सरळ खोड असलेल्या सागवानाची जंगले आणि साजा, बिजा, लांडिया, हलडू, धाओरा, आवळा, सराई, अमलतास यांची भव्य झाडे विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. उदांती अभयारण्याप्रमाणेच सीतानदी अभयारण्याची जमीनही गवत, झाडे, झुडपे इत्यादींनी व्यापलेली आहे. बांबूचे झाड ही येथील सर्वात महत्वाचे झाड आहे. अभयारण्यात सीतानदीशिवाय सोंधुर आणि लीलांज नद्या वाहतात. त्यावर सोंधुर धरण बांधण्यात आले असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. अभयारण्यात असलेल्या जंगलाचा बराचसा भाग सोंधुर नदीच्या पाण्याच्या पातळीच्या खाली आहे, त्यामुळे सीतानदीवरील जंगलांचे नुकसान झाले आहे. याशिवाय येथे खूप मोठा जलाशय बांधण्यात आला आहे. बदललेल्या नैसर्गिक अधिवासामुळे येथे वृक्ष, वनस्पती आणि वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती विकसित झाल्या आहेत. येथे चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा सहज दिसतात. बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रा, जंगली मांजर, तरस, गौर, चौसिंगा आणि हरीणही आढळतात. वाघ देखील येथे आहेत, परंतु त्यांची संख्या कमी आणि लाजाळू स्वभावामुळे ते अधूनमधून दिसतात. संपूर्ण अभयारण्यातील घनदाट जंगलामुळे वन्य प्राणी दिसणे कठीण होते. सीतानदी अभयारण्यात १७५ हून अधिक प्रजातींचे पक्षी असल्याचा दावा केला जातो. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. यापैकी काही जंगली पक्षी, तितर, बुलबुल, कोतवाल, सुतार इ. तसेच उडणारी खार ही एक लुप्तप्राय प्रजाती आहे. खल्लारी येथे असलेले वन विश्रामगृह, वॉच टॉवर, सोंधुर धरण आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. इतर पर्यटन स्थळांपैकी अगस्त्य ऋषी, अंगिरस ऋषी, कंक ऋषी, महर्षी गौतम, मुचकुंद ऋषी, शरभंग ऋषी आणि शृंगी ऋषी यांचे आश्रम पाहण्यासारखे आहेत,
ओना-कोना मंदिर
मंदिरे भारतीय लोकांच्या श्रद्देचा विषय आहे. हे जीवनाचा अविभाज्य अंग आहे. प्राचीन मंदिर वास्तुकला प्रेरणादायी असते. नवीन मंदिरे बांधत राहण्याचा आग्रह हा भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि असीम श्रद्धा आहे. कोणतेही मंदिर कधीही पूर्ण होत नाही, असे इतिहासकार सांगतात, जीर्णोद्धार, पुनर्वसन आणि स्वसंरक्षणाद्वारे ते सतत नूतनीकरण आणि पुनर्निर्मित केले जाते. मंदिराच्या संकल्पनेतही तेच आहे. या पवित्र भूमीवर यापुढेही मंदिरे उभारली जातील. समकालीन साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले ओनाकोना शिवमंदिर हे भारतीय लोकांच्या मंदिरावरील अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे. ओनाकोना हे नावावरून स्पष्ट होते की, बालोद जिल्ह्याच्या गुरूर विकास भागाच्या एका कोपऱ्यात महानदीच्या काठी वसलेले आहे,
हे मंदिर कलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे छत्तीसगडच्या एका कोपऱ्यात हे मंदिर गंगारेल धरणाच्या एका टोकाला आहे, ओनाकोना शिवमंदिर हे नुकतेच बांधलेले मंदिर आहे. किंबहुना ते अजून पूर्ण झालेले नाही. ओनाकोना गाव छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील धमतरी आणि दुर्गच्या सीमेवर रायपूरपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. हे गांगरेल धरणाच्या काठावर आहे. हे मंदिर धमतरी येथील व्यापारी तीरथराज फुटान यांनी बांधले आहे. हे मंदिर फार जुने नाही, हे मंदिर नुकतेच बांधण्यात आले असून या मंदिराचे बांधकाम अजूनही सुरू आहे. सुरू होऊन १७ वर्षे उलटूनही ते अजून अपूर्ण असले तरी त्याचे सौंदर्य अपूर्णतेत आहे. मंदिराचे संस्थापक तीरथराज फुटान यांच्या मते, हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग धामाप्रमाणे बांधले जात आहे. नाशिकमध्ये जसा मंदीर परिसर दिसतो तसाच परिसर उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे नाशिकला यात्रेला जाता येत नसलेल्या गरीब कुटुंबांना ओनाकोना येथे येऊन दर्शनाचा लाभ घेता यावा, हा मंदिराच्या उभारणीचा उद्देश आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता पार करावा लागतो. जरी हे ठिकाण नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे. गांगरेल धरणाचा जलमय क्षेत्र असल्याने हा परिसर आणखीनच सुंदर दिसतो. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक मच्छिमारांकडून बोटींगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. वास्तविक, बालोद जिल्ह्यात पर्यटकांसाठी भरपूर ठिकाणे आहेत. फक्त त्यांचा विकास करण्याची गरज आहे.


गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी एक सुफी संत (बाबा फरीद) येथे आले होते. त्यांनी येथे बसून तपश्चर्या केली. तेव्हापासून येथे शेकोटी पेटवली गेली, जी आजही ग्रामस्थांच्या मदतीने अखंड तेवत आहे. येथे येऊन श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात. येथे एक समाधी देखील बांधण्यात आली आहे, जी मंदिराजवळ आहे.येथे येणा-या लोकांची श्रद्धा पूर्ण होते असा समज आहे.

हे ठिकाण आत्ताच पर्यटकांना आकर्षित करत आहे. मंदिरापर्यंतचा रस्ता अद्याप तयार नाही आणि पर्यटकांना येण्यासाठी पायाभूत सुविधाही तयार नाहीत. याशिवाय या मंदिराच्या आजूबाजूला एक समाधी आणि भगवान श्री रामाचे छोटे मंदिर आहे. ओना कोना गांगरेल धरणाचे एक टोक असण्याबरोबरच ते गांगरेलचे बुडीत क्षेत्रात आहे, त्यामुळे मंदिराभोवती वर्षभर पाणी असते. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना बोटींगची सोय आहे .हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, म्हणूनच याला ताम्रकेश्वर मंदिर असेही म्हणतात. या महाकाल मंदिरात अप्रतिम शिल्पकला आहे, मंदिराच्या संपूर्ण दर्शनी भागावरील शिल्पे केवळ दोषरहित नाहीत तर अतिशय भव्य आहेत. मंदिराचे वास्त्तुकला आणि रचना आकर्षक आहे. ओना कोना मंदिराचा येत्या काळात सर्वात सुंदर पिकनिक स्पॉट्स आणि पर्यटन स्थळांमध्ये समावेश केला जाईल. ओनाकोना हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
ओना कोना कसे पोहोचायचे:
रस्तामार्गे - ओना कोना पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एक पक्का रस्त्याने जायचे असेल तर धमतरी जिल्ह्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आणि राजधानी रायपूरपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेमार्गे - ओना कोनाचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन धमतरी रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे.
हवाईमार्गे - ओना कोनाचे सर्वात जवळचे विमानतळ रायपूर विमानतळ सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.

छत्तीसगडच्या पवित्र भूमीवर 'राम वन गमन पर्यटन सर्किट'
श्री राम यांच्या १४ वर्षांच्या वनवासात छत्तीसगड राज्यातील प्रवेश यात्रेसाठी ‘राम वन गमन पर्यटन सर्किट’ तयार करण्यात येत आहे. छत्तीसगड सरकारने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी नवरात्रीच्या पवित्र सणाच्या मुहुर्तावर या प्रकल्पाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला.
छत्तीसगडचे प्राचीन नाव दक्षिण कौशल आणि दंडकारण्य म्हणून ओळखले जाते. दंडकारण्यमधील भगवान श्री रामाच्या वनप्रवासा दरम्यान काही काळ राहिले होते, याची पुष्टी वाल्मिकी रामायणातून मिळते. स्थानिक मान्यतेनुसार दंडकारण्यच्या आकाशात रावण आणि जटायू यांच्यात युद्ध झाले आणि जटायूच्या शरीराचे काही अवयव दंडकारण्यमध्ये पडले. असे मानले जाते की हे जगातील एकमेव जटायूचे मंदिर आहे. विविध संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान श्रीरामांनी आपल्या १४ वर्षांच्या वनवासातील १० वर्षांहून अधिक काळ छत्तीसगडमधील अनेक दुर्गम ठिकाणी वास्तव्य केले होते. छत्तीसगढच्या लोककथा आणि लोकगीतांमध्ये, राम, भगवान सीता, मैया आणि लक्ष्मण यांच्या कथांचे वर्णन केले जाते आणि येथील भाविकांमध्ये हि गाणी भक्तीने गायली जातात आणि राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवास काळातील अनेक चित्रे इथे बघायला मिळतात. विविध संशोधन, संशोधन प्रकाशने आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, विविध राज्यांमध्ये सापडलेली स्मारके, गुहा, भित्तिचित्रे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित घटना हे सिद्ध करतात की, भगवान राम यांनी अनेक मार्गांनी प्रवास केला आणि १४ वर्षे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वास्तव्य केले होते या वनवासाच्या काळात त्यांचा छत्तीसगडमध्ये वास्तव्य ही या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्तीसगडच्या वनवासात भगवान श्रीरामांनी जवळपास ७५ ठिकाणी भेटी दिल्या होत्या. त्यापैकी ५१ ठिकाणे अशी आहेत जिथे श्रीरामांनी त्यांच्या दौऱ्यात काही काळ मुक्काम केला होता. येथील नद्या, पर्वत, तलाव आणि गुहा येथे श्रीरामांच्या वास्तव्याचे अनेक पुरावे सापडले आहेत.
प्रभू श्रीराम प्रत्येक भारतीयांच्या मनात आणि हृदयात विराजमान आहेत. अयोध्या, उत्तर प्रदेश येथून सुरू झालेला त्यांचा १४ वर्षांचा वनवास मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून गेला आणि शेवटी श्रीलंकेत जाऊन संपला. राम वनगमनाच्या या स्थळांच्या विकासासाठी भारत सरकार, श्रीलंका सरकार आणि विविध राज्यांची सरकारे प्रदीर्घ काळापासून प्रयत्नशील आहेत आणि या ठिकाणी बरेच काम झाले आहे. , याच योजने अंतर्गत छत्तीसगड सरकारनेही छत्तीसगडच्या राम वनगमन मार्गाची आखणी करून ती ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी गेल्या वर्षी एक मोठी योजना आखली आहे.
श्री रामाच्या वनवासाच्या पाउलखुणा उमटलेल्या इतर राज्यांतील अनेक ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाली आहेत किंवा विकासाच्या दिशेने पावले टाकत आहेत हे आपल्या सर्वांना माहीत असताना, छत्तीसगड सरकारने राज्यातील ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील विकसित केली पाहिजे. निवडलेल्या स्थळांचा विकास आणि सुशोभीकरण करणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून जगभरातील लोक येथे येऊ शकतील. हे लक्षात घेऊन राज्य पर्यटन मंडळानेही सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आगामी काळात वार्षिक कार्यक्रम म्हणून विकसित करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे, जेणेकरून छत्तीसगडला पर्यटन नकाशात विशेष स्थान मिळू शकेल.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या आरंग तहसीलमधील चांदखुरी गाव हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे आजोळ आहे हे सर्वश्रुत आहे. प्राचीन काळापासून, राम छत्तीसगडच्या लोकांच्या मानसिकतेशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. आणि हा परिसर रामचे आजोळ असल्याने, राम छत्तीसगडच्या लोकांच्या जीवनशैलीत आणि दैनंदिन दिनचर्येत इतके खोलवर रुजलेले आहेत की छत्तीसगडच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात एकमेकांना राम-राम असे अभिवादन करून होते. आजही छत्तीसगडच्या समृद्ध संस्कृतीत मामा आपल्या पुतण्याला राम म्हणून पाहतात आणि श्रद्धेने त्याच्या चरणांना स्पर्श करतात.
या चांदखुरी गावात असलेल्या प्राचीन कौशल्या माता मंदिरातून ‘राम वन गमन पर्यटन सर्किट’चे उद्घाटन झाले. यामध्ये प्रभू रामाच्या वनवासाची आणि वनप्रवासाची कथा रंगीबेरंगी रोषणाईच्या माध्यमातून प्रकाश आणि ध्वनीद्वारे सांगण्याची व्यवस्था आहे.
सध्या राम-वंगमन स्थळांच्या पहिल्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आठ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
1. सीतामढी हरचौका :- जनकपूर नावाच्या ठिकाणापासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतामढी-हरचौका नावाच्या ठिकाणाहून मवई नदीमार्गे छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील भरतपूर तहसीलमध्ये भगवान श्रीरामांनी प्रथम प्रवेश केला. कोरिया जिल्ह्यातील सीतामढी हरचौका हे रामाच्या वनवास काळातील पहिले स्थान मानले जाते. नदीच्या काठावर वसलेल्या येथील लेण्यांमध्ये १७ कक्ष आहेत. याला सीतेचे स्वयंपाकघर असेही म्हणतात.
2, रामगड टेकडी :-सुरगुजा जिल्ह्यातील रामगढच्या टेकडीवर तीन खोल्या असलेली सीताबेंग्रा गुहा आहे. हे देशातील सर्वात जुने नाट्यगृह मानले जाते. वनवासाच्या काळात राम येथे पोहोचला होता, सीतेची खोली येथे होती, असे म्हणतात. कालिदासांनी येथे मेघदूतम् रचले असे मानले जाते.
3. शिवरीनारायण :-प्रभू राम जंजगीर चंपा जिल्ह्यातील या ठिकाणी थांबले आणि शबरीचे उष्टी बोरे खाल्ले. या ठिकाणी नर-नारायण आणि शबरी यांचेही मंदिर आहे. येथे ढोक, महानदी आणि शिवनाथ नद्यांचा संगम आहे. मंदिराजवळ एक वटवृक्ष आहे, ज्याची पाने दोन आकारात आहेत.
४. तुरतुरिया :-
बलोदाबाजार भाटापारा जिल्ह्यातील या ठिकाणाबाबत महर्षी वाल्मिकींचा आश्रम येथे असल्याची वदंता आहे. तुरतुरिया हे लव-कुशचे जन्मस्थान मानले जाते. बलभद्री ओढ्याचे पाणी खडकांमधून बाहेर पडते, त्यामुळे तुर्तूरचा आवाज येतो, त्यामुळे या ठिकाणाला तुर्तुरिया हे नाव पडले.
५. चांदखुरी :-चांदखुरी हे माता कौशल्याचे जन्मस्थान मानले जाते. १२६ तलाव असलेल्या रायपूर जिल्ह्यातील या गावात जलसेन तलावाच्या मध्यभागी माता कौशल्या मातेचे मंदिर आहे, असे म्हणतात की हे जगातील एकमेव कौशल्या मातेचे मंदिर आहे.
६. राजीम :-
गरियाबंद जिल्हा राजीमला छत्तीसगडचा प्रयाग म्हणतात, जिथे सोंधुर, पॅरी आणि महानदीचा संगम आहे. वनवासाच्या काळात रामाने या ठिकाणी आपले कुलदैवत महादेवाची पूजा केली होती, असे सांगितले जाते, येथील कुलेश्वर महाराजांचे मंदिर याचे साक्षीदार आहे.
७. सिहावा (सप्त ऋषी आश्रम) :-
धमतरी जिल्ह्यातील सिहावाच्या विविध डोंगरावर मुचकुंद आश्रम, अगस्त्य आश्रम, अंगिरा आश्रम, शृंगी ऋषी, कंकार ऋषी आश्रम, शरभंग ऋषी आश्रम आणि गौतम ऋषी आश्रम इत्यादी आश्रम आहेत. दंडकारण्यच्या आश्रमात राम या ऋषींना भेटला आणि काही काळ इथे घालवला.
८. जगदलपूर :-हे बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चहूबाजूंनी जंगलांनी वेढलेले आहे. वनवासाच्या काळात राम जगदलपूर परिसरातून गेल्याचे सांगितले जाते, कारण चित्रकोटचा रस्ता येथून जातो. पांडूच्या वंशज असलेल्या काकतीय राजाने जगदलपूर ही आपली शेवटची राजधानी केली.
दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या क्षेत्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
कोरिया - सीतामढी घाघरा, कोटाडोल, सीमामढ़ी छतौरा (सिद्ध बाबा आश्रम), देवसिल, रामगढ (सोनहट), अमृतधारा, सुरगुजा - देवगड, महेशपूर, बंदरकोट (अंबिकापूर ते दारीमा मार्ग), मेनपत, मंगरेलागढ, पंपापूर, जशपूर-किल्डव्हरकीला ) सरसोर, रक्सगंडा, जांजगीर चंपा-चंद्रपूर, खरौड, जांजगीर, बिलासपूर-मल्हार, बालोदाबाजार भाटापारा- धमनी, पलारी, नारायणपूर (कसडोल), महासमुंद-सिरपूर, रायपूर-आरंग, चंपारण्य, गरिआबंद-फिंगेश्वर, धमतरी-मधुबन (राकडीह), अतारामरा (अतरपूर), सीतानदी-सिरपूर कांकेर (कंक ऋषी आश्रम), कोंडागाव - गडधानोरा (केशकल), जटायुशीला (फरसगाव), नारायणपूर - नारायणपूर (रक्षा डोंगरी), छोटे डोंगर, दंतेवाडा - बारसूर, दंतेवाडा, गीदाम, बस्तर - चित्रकोट, नारायणपाल, तिरथगड, सुकमा - रामराम, इंजाराम, कोन्टा.
राम वनगमन टूरिझम सर्किट नावाच्या या नव्या प्रकल्पामुळे छत्तीसगडमध्ये पर्यटनाचे नवे मार्ग खुले होतील आणि राज्यातील इतर महत्त्वाची पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दिशेने पुढाकार घेतला जाईल, कारण छत्तीसगडमध्ये पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाची हजारो स्थळे आहेत. सुविधांअभावी पर्यटक पोहोचू शकत नाहीत. दळणवळणाच्या सोयी, निवास आणि भोजनाच्या चांगल्या सुविधांसोबतच या ठिकाणांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
संदर्भ :-
१) https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/photo-gallery-know-about-1000-years-ancient-narayanpal-vishnu-temple-built-by-nagavanshi-rulers-in-bastar/2299717
२) https://www.abplive.com/states/chhattisgarh/chhattisgarh-know-the-specialty-about-ancient-temple-of-lord-vishnu-in-bastar-ann-2089122
३) https://www.udanti.com/2021/04/blog-post_0.html
४ ) https://lightuptemples-com.translate.goog/bastar-narayanpal-temple-chhattisgarh/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc
५ ) https://www.etvbharat.com/hindi/chhattisgarh/state/raipur/laxman-temple-was-built-rani-vasata-devi-history-sirpur-laxman-temple/ct20221019131408134134610
६) https://www.abplive.com/states/chhattisgarh/sirpur-mahotsav-ram-and-laxman-temple-have-very-interesting-memories-chhattisgarh-ann-2327457
७ ) https://www.studyrp.in/2022/09/blog-post.html
८ ) https://www.maayboli.com/node/83698
९ ) http://dakshinkosaltoday.com/shivarinarayan/
१० ) http://lalitdotcom.blogspot.com/2018/10/blog-post.html
११ ) https://www.etvbharat.com/hindi/chhattisgarh/state/mahasamund/story-of-gandheshwar-mahadev-temple-from-mahasamund/ct20200218050254888
१२ ) https://npg.news/festival/gandheshwar-mahadev-sirpur-chhattisgarh-shiv-ji-jahan-khud-chal-kar-aaye-bhakt-ke-kareeb-yahan-shivling-ke-sparsh-se-aati-hai-manbhavan-gandh-1243878
१३ ) cgdekho1.blogspot.com
१४ ) https://puratattva-in.translate.goog/sheorinarayan-the-enigma-of-shabari/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=imgs https://grandnews.in/2024/10/02/cg-temple-a-unique-incomplete-temple-of/
१५ ) https://indianvagabond.com/2019/10/04/malhar-temples-bilaspur/
१६ ) https://www.bhaskar.com/news/MAT-CHH-OTH-c-206-82046-NOR.html
१७ ) https://www.etvbharat.com/hindi/chhattisgarh/state/balod/ona-kona-temple-is-full-with-natural-beauty-in-gurur-of-balod/ct20200907195821946
१८ ) https://organiser.org/2022/08/07/90762/bharat/incomplete-yet-charming-shiv-mandir/
https://www.cginfo.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A4%BC-%E0%A4%95/
१९ ) https://hindutemples-india.blogspot.com/2021/11/garh-dhanora-group-of-temples-chattisgarh.html
Sirpur - Heritage Unearthed
Long, long ago, there was a city on the banks of a river. The builders planned it well. They built on the right side of the river, allowing for the natural slopes, which ensured that when the river swelled during the monsoons, the extra flow would be to its left, leaving the city dry. The main walls of the town were built in a direction along the river, so that in case there ever was a flood, it would do the least damage. They built massive temples for their deities, towering over the city, so everyone could see the spires, and hear the bells from their houses.
 |
| Surang Tila |
As the city grew, traders arrived, bringing with them goods the locals had never seen before. Soon, the city planners built a marketplace, so more traders arrived. As knowledge grew, so did the facilities. As visitors grew, so did the religions. Buddhism arrived, and then Jainism; and the new arrivals built their own temples and monasteries.
 |
| One of the Buddha Viharas |
No one minded. After all, everyone contributed to the growth of the city. They lived in relative peace, despite the wars all around them. Regimes changed, but life went on, with little discord among the residents. Would it have remained the same? We do not know, for nature had other ideas. A massive earthquake rent the town, and all the planning couldn’t save the residents. As the houses crumbled and the river burst her boundaries, the people were left with just one choice – to flee. The toll must have been huge, and we will never know how many escaped, and how many succumbed. The city was abandoned, and reclaimed by earth. Centuries passed, and the city was forgotten. Till someone turned up with a spade and began digging. Long forgotten structures emerged from the earth, and the city started taking shape again, albeit in another form – as a relic of a time gone by.
This is the story of Sirpur, in Chhattisgarh. The erstwhile city, most of which is still buried under the earth, went by many names over the period it flourished, chiefly among them, Sabaripura, (for Sabari from the Ramayana, who is said to have offered fruit to Rama somewhere in this region,) and Shripura, which is where the present name comes from. Sirpur’s glorious history first came to light in 1872, when Alexander Cunningham, the founder and first director of the Archaeological Survey of India, discovered the most impressive structure here – the Lakshman Temple. Recent excavations have uncovered 22 Shiva temples, 5 Vishnu temples, 12 Buddha Viharas, 1 Jain Vihara, a huge marketplace with an underground granary market, hospital, and a medicinal bath! And these appear to be simply the tip of the iceberg, since there are many more mounds yet to be excavated!
 |
| An underground granary |
The two most impressive temples are the Lakshman Temple and the Gandheshwar Mahadev temple, the first dedicated to Vishnu and the second to Shiva. While the first is solely maintained by the ASI, the second is still frequented by devotees.
 |
| The Lakshman Temple |
The Baleshwar Mahadev mandir, has a pair of Shiva temples side by side, said to have been built by a king for his two wives! Surrounding it are remnants of other temples, which lead to the belief that this must have been a temple complex at one time. The main sanctum in these shrines must have been in the shape of a star, which is one of the most interesting things about them.
 |
| One of the shrines at the Baleshwar Mandir. Note the 6 pointed star shape of the sanctum. |
The Buddha Viharas are no less interesting, with extremely intricate sculptures lining the doorway and the pillars, most of which seem to have been found intact! Interestingly, they seem to depict a wide range of stories, from the Panchatantra to the erotic!
 |
Sculptures at the entrance to the Buddha Vihara. The amorous couples do grab our attention, but look above them at the detailed miniature depiction of a ram fight! |
However, the most interesting, and impressive structure is what is locally called the ‘Surang Tila’, since it was believed that there was a tunnel (surang) under the mound which existed here. As it turns out, there was no tunnel, but this must have been the highest structure in Sirpur during its prime. Much of it remains intact, which is also why it shows us a glimpse of the reason for Sirpur’s decline – the massive earthquake.
 |
| Locals at the Surang Tila |
The structure is an enormous platform, with steps leading to the top, where there are 5 shrines, four housing Shiva and one, Ganesha. It must have been quite an important structure in its time, for, on one side is what must have been the priest’s house – a huge structure which gives us an idea of how important the priest must have been; and to the south is a Tantric shrine, housing the trinity – Brahma, Vishnu and Shiva.
 |
| One of the shrines at the Surang Tila, with the sculptures and pillars found here arranged in a row |
This structure was certainly built to withstand natural disasters, considering that it has stood the test of time. Besides, the massive quake which turned the city to rubble only managed to dent the structure, folding the steps inward! That is the reason for the apparently curved steps you can see here.
 |
| The steps which seem to have folded inwards, during the earthquake |
The only thing that surpasses the Surang Tila in conception and magnificence is the marketplace. Set out in neat rows, just off the riverbank, this is a masterpiece of planning. With spaces for the individual traders, temples for them to worship in, ayurvedic baths for them to rejuvenate, and even a hospital, everything seems to be well thought out. There are underground granaries which have provision for keeping the grain from spoiling, depressions for the grain to be ground into flour, and even safes for keeping the money earned! No wonder, traders flocked here from across the world!
 |
| A view of the marketplace. Look how it is seems to have been arranged in straight rows! |
These are certainly some of the most impressive monuments Sirpur has to show us. However, these aren’t the only ones. There are about 40 monuments in all, each of them with a story to tell, and masterpieces to show off. As we realized, three days were barely enough to scratch the surface. It did give us a peek into the Sirpur of the past, and made me want to go again, in peace, and with time to spare, so I could explore more.
 |
Another view of the marketplace, with two Bodhi trees in the background. It is believed that the saplings of these trees were brought from Bodh Gaya by the Buddhist monks who settled here |
I visited Sirpur to attend the Music and Dance festival, on invitation from the Chhattisgarh Tourism Board. I am grateful to them for giving me an opportunity to visit a new state.
Special thanks to Mr. Arun Kumar Sharma, the retired archeologist who excavated many of the monuments, for spending time with us, taking us around, explaining the importance of these monuments, and most importantly, answering all our questions with immense patience and good humour!
Information:
- Location: Sirpur is located in Chhattisgarh, about 80 Km from the state capital, Raipur.
- By Air: The nearest airport is at Raipur, a drive of about 3 hours.
- By Train: The nearest railway station is Mahasamund (30Km), though Raipur (80 Km) is better connected.
- By Road: Buses are available from Mahasamund as well as Raipur, and the roads are good. However, the buses aren’t too frequent, so it is better to hire a car for the journey. Also, there are no cars or autos available at Sirpur, so it is best to hire a car for the whole trip.
- The only accommodation available at Sirpur is at Hiuen Tsang, the resort run by Chhattisgarh Tourism. Book early, because there are a limited number of rooms.
- There are more options available at Raipur, which has hotels to suit every budget.
- It is possible to make a day trip to Sirpur from Raipur, but if you want to explore all the monuments, stay overnight at Sirpur.
Hindu Temples of India
Dipadih Ancient Temple Ruins, Chattisgarh
Dipadih
Ancient Temple
Ruins are group of
ancient Hindu temples dedicated to the Lord Shiva, Lord Vishnu and Goddess
Sakthi located in Dipadih Village in Kusmi Tehsil in Balrampur District in the Indian state of Chattisgarh.
This temple
complex is believed to be built in 8th – 14th century CE.
The Temple ruins are considered one of the protected
monuments in Chattisgarh declared by Archaeological Survey of
India. Dipadih is located at the confluence of Kanhar and
Galphulla River.



The Temple Complex
The Temple Complex consist of
remains of ancient temples dedicated to Lord Shiva, Lord Vishnu and Goddess Sakthi
dated to 8th – 14th century CE. The remains are found scattered
around the village of Dipadih. It is said that the village houses six major temples
and 74 minor temples. The remains spread over an area of about 1 Km.



The Sarna temple is considered
as the major shrine in the temple complex. It is believed to be built in memory
of King Samant Sarna who lost his life in a battle. The temple is built in
Panchayatana style i.e. main shrine surrounded by four subsidiary shrines. The
doorway to the sanctum is profusely carved.



Gajalakshmi can be seen on the
lintel of the doorway. The sanctum enshrines a Shiva Linga. Images of Nayikas
in various postures can be seen on the pillars. The structure might have been
massive in its heydays but now only the foundation remains. There is a very
unique idol of two lions with one head can be seen on the adhisthana of the
temple.



Remains of several temples can
be seen in Uraon Tola, Rani Pokhara, Borja Tila, Semal Tila and Ama Tila. Sculptures
of Brahma, Durga, Ganga, Yamuna, Vishnu, Kuber, Kartikeya, Mahishasura Mardini,
Chamunda, Gajalakshmi, Uma Mahesvara, Alingana Murthy, Nardana Ganesha, Rudra
Bhairava and several Shiva Lingas can be found in the temple complex.



Connectivity
The
Temple is located at about 2 Kms from Dipadih Bus Stand, 24 Kms from Kusmi, 68
Kms from Balrampur, 77 Kms from Ambikapur, 81 Kms from Ambikapur Railway
Station, 92 Kms from Ambikapur Airport and 231 Kms from Ranchi Airport. The
temple is situated on Kusmi to Ambikapur route.
Location
Bagalamukhi Temple, Amleshwar, Chattisgarh
Bagalamukhi Temple, Amleshwar,
Chattisgarh
Bagalamukhi Temple is a Hindu
Temple dedicated to the Goddess Sakthi located in Amleshwar Village near Raipur Town
in Raipur Tehsil in Raipur District in the Indian state of Chattisgarh. The
temple is famously called as Maa Pitambara Temple.


Legends
As per
legend, a great storm started destroying creation in Satya Yuga. Lord Vishnu was
disturbed and performed austerities to appease the
goddess Parvati on shore of Haridra Sarovar, the lake
of turmeric. Pleased with his penance, the goddess Parvathy appeared and
brought forth her manifestation Bagalamukhi from the lake. Bagalamukhi calmed
the mighty storm, restoring order in the universe.
History
The
temple was established by Param Pujaya Shri Pitambara Pithadhishwar
Yogiraj Youdhishthir Ji Maharaj.
The Temple
It is
a newly built temple. The sanctum enshrines the presiding deity, Goddess Bagalamukhi.
She is considered one among the ten Mahavidyas in Hinduism. She is also called
as Pitambara Maa. She is depicted seated on a golden throne which lies in the
midst of an ocean of nectar abound with full of yellow lotuses. She is normally
depicted in golden complexion and always seen in a yellow dress. Her head is
adorned with a crescent moon.
Temple Opening Time
The
temple remains open from 09.00 AM to 06.00 PM daily.
Festivals
Navaratri
is the major festival celebrated in this temple. Guru Purnima and Vasant
Panchami are also observed here.
Connectivity
The
Temple is located at about 10 Kms from Raipur, 11 Kms from Raipur Junction
Railway Station, 11 Kms from Raipur Bus Stand, 23 Kms from Raipur Airport, 24
Kms from Patan and 39 Kms from Durg. The Temple is situated on Raipur to Patan
route.
Location
Garh Dhanora Group of Temples, Chattisgarh
Garh Dhanora Group of Temples,
Chattisgarh
Garh Dhanora Group of Temples are group of
Hindu Temples dedicated to the Lord Shiva and Lord Vishnu located in Garh
Dhanora Village in Keshkal Tehsil in Bastar District in the Indian state of Chattisgarh. The Temples are one of the
protected monuments in Chattisgarh declared by Archaeological Survey of
India.



History
All the brick structures in the
group were built in 5th – 7th century CE by the rulers of
Nala Dynasty.



The
Group of Temples
Garh Dhanora village consists of three groups of
temples namely Vishnu Temple Group, Banjarin Temple Group and Gobarahin Temple Group.
The Vishnu Temple Group consists of 10 temples consists of Vishnu, Shiva and
Narsimha Temples. The Banjarin Temple Group consists of four ruined temples and
remains of residential buildings.



The Gobarhin Temple group has a large brick mound
containing Shiva Linga on the sanctum at top and another small temple remains. There
is also a series of 10 Shiva lingas at another place, situated at about 500
metres from the major temple group. There is also an old pond in this village. The
specialty is it never dries, and the water changes its colors. There are also
few waterfalls in the surrounding area.



Festivals
A huge fair is organized
here during Mahashivaratri. Mondays in the month of Sawan is considered
auspicious here.
Connectivity
The temples are located at
about 6 Kms from Keshkal Bus Stand, 7 Kms from Keshkal, 36 Kms from Kanker, 56
Kms from Kondagaon, 86 Kms from Bhanupratappur
Railway Station, 130 Kms from Jagdalpur Airport and 131 Kms from Jagdalpur. The
temple is situated on Kanker to Jagdalpur route.
Location
बस्तरची तोंडओळख
काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट
पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण
त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य.
रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट
निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या
उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर
माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्यात मारले गेलेले पोलीस किंवा नागरिक
याव्यतिरिक्त काही दिसतच नव्हतं. आधीच दुर्गम प्रदेश आणि त्यात असे
असुरक्षित वातावरण. त्यामुळे एकट्याने प्रवास करणे जरा अवघडच होणार होते.
योगायोगाने एका माहितीतल्या ग्रुपने पुढच्याच महिन्यात चार दिवसांची बस्तर
ट्रीप आयोजित केली असल्याचे फेसबुकवर वाचनात आले. सुट्टीचं आणि पैशाचं गणित
जुळतंय हे बघून मी ताबडतोब ट्रीप बुक करून टाकली.
 |
| बस्तर जिल्ह्याचे स्थान |
बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला
ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या
सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर
वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर,
दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता.
साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या
त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत
राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या
त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी
होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. आमची ट्रीप दसऱ्याच्या सुमारासच आयोजित
केलेली होती. या वर्षीचा परतीचा पाऊस रेंगाळला होता. नवरात्र सुरु झाले
तरी अधूनमधून सरी येत होत्या. त्यामुळे कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार
वनराईसोबत एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार या विचाराने मी भलत्याच
उत्साहात होतो.
यथावकाश प्रवासाचा दिवस उजाडला.
संध्याकाळी साडेआठला सुटणाऱ्या समरसता एक्स्प्रेसचे आरक्षण होते. यावेळी
ग्रुप केवळ दहा जणांचा होता. सगळ्यांशी ओळखी-पाळखी झाल्या आणि आमचा प्रवास
सुरु झाला. मुंबई ते रायपूर म्हणजे सुमारे अठरा तासांचा प्रवास. एवढा
प्रवास, तोही स्लीपर कोचमधून करायचा म्हणजे मी थोडा धास्तावलोच होतो. पण ऑफ
सिझन असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती. दिवसभरच्या दगदगीने मी शिणलो
होतो. बर्थ मिळताच आडवा झालो. स्लीपर कोच मधल्या कोलाहलातली झोप म्हणजे
यथा-तथाच. थोडाफार वेळ डोळा लागला तरी खूप. म्हणता म्हणता गाडी रायपूरला
पोहोचली. भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाचा मान राखत गाडीने चांगला दीडेक तास
उशीर केला होता. लांबच्या प्रवासाने आम्ही सगळेच कंटाळले होतो. त्यात
पावसाची चिन्हं दिसत होती. त्या उष्ण आणि दमट हवेत जीव नकोसा होत होता.
इथून पुढे बस्तरमधली एक स्थानिक पर्यटन कंपनी आमची व्यवस्था बघणार होती.
त्या कंपनीचे प्रतिनिधी पार्किंगच्या जागेत आमची वाट बघत थांबले होते.
आम्ही येताच त्यांनी गळ्यात हार आणि कपाळाला गंध लावून आमचे जंगी स्वागत
केले. इतक्या प्रसन्न स्वागताने आमचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला! मोठ्या
उत्साहात आम्ही बसमध्ये बसलो.
 |
| रायपूरमध्ये झालेले जंगी स्वागत |
आमचा पहिला मुक्काम होता चित्रकोट धबधबा.
रायपूरहून तिथले अंतर होते सात तासांचे! थोडक्यात प्रवास अजून संपला
नव्हताच! मजा-मस्ती करत आमची गाडी चित्रकोटकडे निघाली. वाटेत थोडा वेळ
जेवणासाठी थांबून आम्ही पुढे रवाना झालो. अंधार पडल्याने आजूबाजूचा निसर्ग
काही अनुभवता येत नव्हता. मी गुमान कानात हेडफोन घालून झोपायचा प्रयत्न करू
लागलो. निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. अखेरीस रात्री एकच्या सुमारास
आम्ही चित्रकोट धबधब्याला पोहोचलो. बसमधून उतरलो आणि एक ओलसर गारवा अंगाला
जाणवला. दूर कुठेतरी पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. अंधारात चाचपडत
आम्ही कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. कंपनीचा संचालक जीत सिंग तिथे स्वागताला
हजर होता. तिथल्या आदिवासी सहाय्यकांनी ढोल वाजवून आणि हातात रानफुले देऊन
सगळ्यांचे स्वागत केले. इथल्या लोकांनी “अतिथी देवो भव” फारच मनावर घेतलेले
दिसत होते. त्यांच्या स्वागताच्या पद्धती कितीही छान असल्या तरी त्यांना
छान म्हणण्याइतकेही त्राण आता अंगात उरले नव्हते. आता मात्र झोप अनावर होत
होती. एकदाची तंबूत बॅग टाकली आणि निद्राधीन झालो.
चित्रकोट जलप्रपात
पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे
पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर
आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता.
रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद
प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी
निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती
नदीचे पात्र, त्याला आलेला काहीसा अंतर्वक्र आकार, आणि त्यावरून धबाबा
कोसळणारे फेसाळते पाणी. मंद धुक्यातून पूर्व क्षितिजावर उगवलेला
सहस्ररश्मी, त्याच्या केशरी प्रभेत न्हालेला आसमंत, पहाटेची निश्चल शांतता,
आणि तिला पुरून उरणारा त्या प्रपाताचा ध्रोंकार! सारे विलक्षणच होते. मी
ताबडतोब कॅमेरा काढला आणि तो क्षण बंदिस्त केला. अर्थात, कॅमेऱ्याच्या
सेन्सरवर उमटलेले ते चित्र आणि त्या क्षणाची अनुभूती यात जमीन-अस्मानाचे
अंतर होते. असो.
 |
| पहाटेच्या केशरी प्रकाशात चित्रकोट धबधबा |
कॅम्पसाईटच्या बाजूलाच एक निरीक्षण मनोरा
उभारलेला होता. त्याच्या खाली दोन-चार खोल्या, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची
व्यवस्था उपलब्ध होती. खालच्या खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध व्हायला अजून
वेळ होता. मुख्य म्हणजे अजून विजेची व्यवस्था झालेली नव्हती. जीतने मोठ्या
कल्पकतेने ती जागा कॅम्पसाईट साठी निवडली होती. मनोऱ्याच्या गच्चीवरून तर
धबधब्याचे दृश्य अधिकच मोहक दिसत होते. एक-एक करत सारी मंडळी उठली.
तेवढ्यात चहा आलाच. गच्चीवरून धबधबा न्याहाळत आम्ही गरम चहाचा आस्वाद घेत
होतो. एकीकडे जीत बस्तरची आणि लोकजीवनाची माहिती देत होता. जीत मूळचा
जगदालपूरचा. उच्च शिक्षण, मग मोठ्या शहरात नोकरी, आणि देशभर भटकंती करून तो
आपल्या मूळ शहरात परतला होता. बस्तरचे अनवट सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी
त्याने Unexplored Bastar नामक कंपनी सुरु केली. पर्यटकांना त्यांचा
पसंतीनुसार रूपरेषा बनवून देण्यासोबतच स्थानिक लोकांना रोजगार, त्यांच्या
संस्कृतीचे जतन, आणि पर्यावरण संवर्धन असा व्यापक हेतू डोळ्यांसमोर ठेऊन तो
काम करतो. सध्या तरी सुरुवातीचे दिवस आहेत. पण एकंदरीत मिळणारा प्रतिसाद
उत्तम आहे. त्याच्या धाडसाचे आणि ध्येयासक्तीचे आम्हा सगळ्यांनाच फार कौतुक
वाटले. एव्हाना आठ वाजत आले होते. नाश्ता तयार व्हायला थोडा वेळ लागणार
होता. त्यामुळे आधीच धबधब्यावर जाऊन यायचे आम्ही ठरवले.
 |
| मनोऱ्याच्या गच्चीवर |
मनोऱ्याच्या मागच्या बाजूने एक वाट खाली
उतरत होती. वाट कसली, चांगला बांधलेला जिनाच होता तो. तिथून खाली उतरून
आम्ही नदीच्या पात्राजवळ पोहोचलो. काठाने वाढलेल्या झाडीतून वाट काढत
प्रवाहाच्या डाव्या अंगाने धबधब्याजवळ जाऊ लागलो. पाण्याचा प्रवाह कमी असतो
तेव्हा त्या वाटेने चक्क मुख्य धबधब्याच्या मागे जाता येते. मात्र सध्या
प्रवाह चांगलाच तेजीत होता. शिवाय पुढचे दगड निसरडे झाले होते. त्यामुळे
ठराविक अंतरापर्यंतच जायला मुभा होती. झाडीतून बाहेर पडलो तसे नदीचे पात्र
नजरेस पडले. तिथे एक स्थानिक तरुण लहानशी होडी घेऊन उभा होता. होडीतून
पात्राच्या मध्यात जाऊन समोरासमोर धबधबा पाहण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक
होतो. सगळ्यांनी लगेचच त्याच्यासमोर रांग लावली. तिथे गर्दी झालेली बघून
आम्ही दोन-तीन जणांनी थोडे आसपास फिरून यायचे ठरवले. त्याच वाटेने आम्ही
पुढे निघालो.
आता डावीकडे उंच कडा आणि उजवीकडे नदीचे
पात्र अशा चिंचोळ्या पट्ट्यातून ती वाट जात होती. कड्याच्या पोटात काही
गुहा खोदलेल्या दिसत होत्या. त्यात काही शिवलिंगे आणि कोरीव मूर्तीही दिसत
होत्या. कधी काळी इथे एखादे मंदिर असावे. काही अंतरातच ती वाट प्रचंड
शिळांच्या ढिगाऱ्यात हरवली. पुढे जाणे धोकादायक होते. आम्ही तिथेच थांबलो.
धबधब्याचा ध्रोंकार आता कानांवर आदळत होता. प्रवाहाची एक लहानशी धार
कुठूनतरी वेगळी होऊन डावीकडच्या कड्यावरून समोरच्या दगडावर कोसळत होती.
त्याचे तुषार अंगावर उडत होते. त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शिळा, बाजूला
विखुरलेले कोरीव भग्नावशेष, आणि समोरचा तो महाकाय जलप्रपात त्या जागेला एक
अद्भुत आयाम देत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी काही क्षण ती जागा
अनुभवत शांत उभा राहिलो. समोर कोसळणारी ती धार खुणावत होती. फार विचार न
करता मी सरळ त्या धारेखाली जाऊन बसलो. थंड पाणी मस्तकावर आदळले आणि एक
शिरशिरी देहात जाणवली. क्षणभर कुडकुडलो, पण लगेचच त्या तापमानाला शरीर
सरावले, आणि मन त्या प्रवाहाशी जणू एकरूप झाले. ब्रह्मानंद म्हणतात तो हाच
का?
किती वेळ मी तिथे बसलो होतो देव जाणे!
माझी तंद्री भंगली तेव्हा कळले की सोबतचे दोघे कधीच मागे गेले होते आणि
कोणीतरी लांबून मला हाका मारत होते. चरफडतच मी उठलो आणि कॅम्पसाईटवर परतलो.
नाश्ता तयार होता. खास बस्तर पद्धतीचा दालवडा आणि चटणी यांवर आम्ही ताव
मारला. सोबतीला चहाची अजून एक फेरी होतीच. आता उन्हं वर आली होती.
धबधब्याच्या बाजूने काहीसे फिकट इंद्रधनुष्य तयार झाले होते. दिवसाच्या
प्रत्येक वेळी तो धबधबा आपल्या सौंदर्याची वेगळी छटा दाखवत होता. त्याचे
किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस जीत म्हणाला, अजून
तीन-चार धबधबे बाकी आहेत बघायचे. कॅमेऱ्याची बॅटरी आणि मनाचा उत्साह जपून
ठेवा! तरी मी अजून थोडे फोटो काढलेच. सगळ्यांचा नाश्ता आणि आन्हिकं
उरकल्यावर आम्ही आसपासच्या इतर काही जागा पाहण्यासाठी बाहेर पडलो.
मेंद्री घुमड धबधबा आणि बस्तरचे पारंपरिक भोजन
चित्रकोट धबधब्याचे रौद्रसौंदर्य अनुभवून
आम्ही आसपासच्या काही जागा बघायला बाहेर पडलो. बस्तर जिल्हा वनसंपदेसोबतच
अनेक लहानमोठ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या यादीतली पहिली जागा
होती मेंद्री घुमड धबधबा. चित्रकोटवरून बस निघाली आणि बस्तरच्या अनवट
रांगड्या प्रदेशातून आमचा प्रवास सुरु झाला. सगळीकडे भातशेती डवरलेली दिसत
होती. रोपांची पाती दुपारच्या उन्हात चमकत होती. त्या नाजूक पोपटी
रोपांमध्ये जणू अवघ्या विश्वाची क्षुधातृप्ती सामावली होती. आकाशात
एखाद-दुसरा काळा ढग उगीच वाट चुकल्यागत रेंगाळलेला दिसत होता.
 |
| डवरलेली भातशेती |
अर्ध्या तासातच आम्ही एका पठारावर येऊन
पोहोचलो. तिथे इतरही काही गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. पण धबधबा
काही कुठे दिसत नव्हता. लांब कुठेतरी लोकं जमलेली दिसत होती. त्यापुढे दरी
आणि तिथेच धबधबा असावा बहुतेक. आम्ही त्या दिशेने चालत पुढे निघालो. थोडं
अंतर जाताच वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवला. हा नक्कीच दरीतून उसळून वर येणारा
वारा. आता उत्सुकता अजूनच ताणली जात होती. पाचेक मिनिटं पुढे गेलो आणि एक
विस्तीर्ण दरी नजरेस पडली. नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडीने ती दरी
व्यापलेली होती. दरीच्या डाव्या कोपऱ्यातून एक पांढरीशुभ धार खाली कोसळताना
दिसत होती. पठाराच्या खडकाचा तांबूस रंग आणि दाट वनश्रीचा गडद हिरवा रंग
त्या शुभ्र फेसाळत्या धारेला उठाव देत होते. वाऱ्याच्या वेगाने मधेच ती धार
विस्कळत आणि हेंदकाळत होती. जणू धारेतले ते थेंब वाऱ्याच्या मदतीने
रोलरकोस्टर राईडचा अनुभव घेत होते. कोसळणारे पाणी, मग ते कोणत्याही
स्वरूपात असो, मनाला एक वेगळाच आनंद देते. कुठे चित्रकोट प्रपाताचा एखाद्या
तपस्वीच्या मुखातून निघालेल्या ओंकारागत भासणारा प्रचंड ध्रोंकार, तर कुठे
लहानग्या मुलीने मांडलेल्या भातुकलीच्या खेळासारखा वाटणारा मेंद्री घुमडचा
प्रवाह. रूप वेगळे, आकार वेगळा, पण मनात उमटणारे तरंग तेच! वाहते पाणी
बघून मेंदूत काही ठराविक संप्रेरके निर्माण होत असावीत कदाचित. असो. त्या
जागी निवांत बसावं आणि नुसता निसर्गाचा अवखळ खेळ पहात रहावं असं वाटत होतं.
पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच असावं बहुतेक. आतापर्यंत वाट चुकून
रेंगाळलेले वाटणारे काळे ढग आता मेंढरांच्या कळपासारखे आकाशात गर्दी करू
लागले. दरीतून घोंघावणारा वारा त्यांना अजूनच प्रोत्साहन देऊ लागला.
वातावरणाचा बदलता नूर पाहून आम्ही घाईघाईत तिथे दोन-चार फोटो काढले आणि
बसच्या दिशेने धावलो.
 |
| मेंद्री घुमड धबधबा |
 |
धबधब्यासमोरची विस्तीर्ण दरी
|
तीरथगढ धबधब्यावरील रम्य पहाट
पहाटे साडेसहाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने
जाग आली. उठून बाहेर पाहतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली गर्द
हिरवाई! रात्री इथे पोहोचलो तेव्हा अंधारात काहीच कळले नव्हते. आता
दिवसाउजेडी लक्षात येत होते की आम्ही कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाच्या आत
आलो आहोत. नुकताच सूर्योदय झाला होता. कोवळ्या उन्हात गवतावरचे दवबिंदू
चकाकत होते. वातावरण आल्हाददायक होते. तीरथगढ धबधबा तिथून अगदी हाकेच्या
अंतरावर होता. जीत म्हणाला, चला सगळे धबधब्यावर जाऊ. आत्ता गर्दी अजिबात
नसेल आणि मनसोक्त फोटो काढता येतील. काही जण अजून साखरझोपेत होते. ते
उठायची वाट न पाहता आम्ही सात-आठ जण कॅमेरा घेऊन लगेचच जीतसोबत निघालो.
पाचेक मिनिटांतच धबधब्याचा ध्रोंकार ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने जणू
वातावरणातच काहीशी उर्जा निर्माण केली होती. पर्यटन विभागाने धबधब्याच्या
परिसराबाहेर एक तिकीट खिडकी आणि गेट उभारले होते. बाजूलाच वाहनतळ होता.
आत्ता पहाटेच्या वेळी तिथे शुकशुकाट होता. आजूबाजूच्या लहान-सहान
दुकानांतले लोक नुकतेच उठून धंद्याची तयारी करायला लागले होते. गेट उघडेच
होते आणि तिकीट खिडकीवरही कोणीच नव्हते. आम्ही सरळ आत शिरलो. आता पाण्याचा
आवाज चांगलाच तीव्र झाला होता. समोर खोल दरी असावी असे भासत होते. आम्ही
धबधबा वरच्या अंगाने बघणार आहोत हे तेव्हा उमजले.
 |
| आवेगात कोसळणारा तीरथगढ धबधबा |
थोडं पुढे गेलो आणि डाव्या अंगाने जोमात
वाहत येणारा एक प्रवाह दिसला. त्याच्या पाण्याने आजूबाजूला बरीच डबकी तयार
झाली होती. ती पार करून आम्ही दरीच्या जवळ गेलो. एकेका पावलागणिक धबधब्याचे
टप्पे नजरेस पडू लागले. डावीकडून येणारा प्रवाह वेड्या आवेगात कड्यावरून
खाली झेपावत होता. पांढऱ्या शुभ्र धुमाळांना कोवळ्या उन्हाने सोनेरी छटा
बहाल केली होती. काही मिनिटांपुरती मिळालेली ती छटा वाहणारे पाणी मोठ्या
दिमाखात मिरवत होते. पाण्याच्या वेगाने त्या उभ्या कड्याला पायऱ्या पडल्या
होत्या. त्यांच्यावरून खेळत आणि उड्या मारत ते पाणी समोरच्या निमुळत्या
दरीत कोसळत होते. तिथून पुढे वाटवळणे घेत तो प्रवाह दरीला चिरत पुढे जात
होता. हीच कांगेर नदी आणि समोर दिसणारी दरी म्हणजे तिचे खोरे. दरीवर हलकेसे
धुके पसरले होते. उगवत्या सूर्याची केशरी किरणे त्या धुक्याच्या दुलईला
घालवण्याचा आटापिटा करीत होती. पण गजर बंद करून पाच मिनिटे अजून असं म्हणत
झोपणाऱ्या आपल्या सगळ्यांसारखी ती दरीही जणू धुक्याची दुलई ओढून घेत होती.
नदीच्या दोन्ही काठांनी गच्च रान भरले होते. धुक्याची दुलई धरून ठेवण्यात
त्या वनराईचा हातखंडा होता. धबधबा वाहतच होता. दिवस असो वा रात्र, उन्हाळा
असो वा हिवाळा, जोपर्यंत अंगात जोम आहे तोपर्यंत वाहायचे हा त्याचा
स्थायीभाव. त्या निवांत भूदृश्यात खळखळणारा धबधबाच तेवढा गतिमान होता.
राम वन गमन पर्यटन सर्किट योजना वेगाने विस्तारत आहे
छत्तीसगड
सरकारची राम वन गमन पर्यटन सर्किट योजना वेगाने विस्तारत आहे. या
प्रकल्पांतर्गत 51 ठिकाणांची निवड करण्यात आली असून, तेथे टप्प्याटप्प्याने
काम सुरू आहे. पहिल्या आणि दुस-या टप्प्यांतर्गत राजधानी रायपूरच्या
चांदखुरी येथील कौशल्या माता मंदिर आणि जांजगीरमधील शिवरीनारायण यासह ९
ठिकाणी काम जवळपास पूर्ण झाले आहे. राम वन गमन पथाचा प्रभाव
छत्तीसगडमध्येही दिसू लागला आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय
वाढ झाली आहे. त्याचबरोबर येथील मंदिरांच्या खजिन्यातही १० पटीने वाढ झाली
आहे.
रामाचा वनमार्ग कोणता?
छत्तीसगड सरकारच्या ड्रीम
प्रोजेक्टपैकी एक म्हणजे राम वन गमन पथ. यामध्ये ती ठिकाणे विकसित केली जात
आहेत जिथे असे मानले जाते की प्रभू रामाने वनवासाचा काळ घालवला होता. या
अंतर्गत कोरिया जिल्ह्यापासून सुकमापर्यंतच्या राम वन गमन मार्गावर
प्रत्येक पायरीवर लोकांना भगवान श्री रामाचे दर्शन होईल. राम वन गमन पथाची
एकूण लांबी अंदाजे 2260 किलोमीटर आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी साईन बोर्ड
आणि श्रीरामाच्या वनवासाशी संबंधित कथा पाहायला आणि ऐकायला मिळतील. या
रस्त्यांवर अनेक प्रकारची झाडे लावली जात आहेत. प्रभू रामाच्या वनवासाच्या
काळातील आठवणी लोकांच्या मनात तशीच अनुभूती देणारे हे झाड. 135 कोटी रुपये
खर्चाच्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. माता कौसल्या मंदिराच्या
विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
कौशिल्या माता मंदिराचे रूप बदलले
छत्तीसगडमध्ये
राम वन गमन पथ अंतर्गत 51 स्थळांची निवड करण्यात आली आहे. प्रभू राम यांनी
त्यांच्या दौऱ्यात या ठिकाणी काही काळ घालवला. राज्य सरकारने पहिल्या
टप्प्यासाठी नऊ ठिकाणांची निवड केली आहे. यामध्ये सीतामढी-हरचौका (कोरिया),
रामगढ (अंबिकापूर), शिवरी नारायण (जांजगीर-चंपा), तुर्तुरिया
(बालोदाबाजार), चांदखुरी (रायपूर), राजीम (गारियाबंद), सिहावा-सरिशी आश्रम
(धमतरी), जगदलपूर (बस्तर) आणि रामाराम (सुकमा) यांचा समावेश आहे.
https://www.udanti.com/2021/10/blog-post_79.html
शिवरीनारायण-जगन्नाथ कनेक्शन
छत्तीसगढ़ राज्य रामायण और महाभारत महाकाव्यों से जुड़े स्थानों के मामले में बहुत समृद्ध है। शिवरीनारायण शहर का संबंध रामायण महाकाव्य की शबरी से है, जो इसे हिंदुओं के बीच एक महत्वपूर्ण तीर्थ स्थल बनाता है। महानदी और जोंक नदियों के संगम पर स्थित होने के कारण इसकी पवित्रता और भी बढ़ जाती है। शिवनाथ नदी शिवरीनारायण से थोड़ी दूरी पर महानदी में मिलती है, इसलिए कभी-कभी कहा जाता है कि यह शहर इन तीन नदियों के संगम पर स्थित है, जो एक त्रिवेणी संगम बनाते हैं ।
शिवरीनारायण शहर छत्तीसगढ़ के जांजगीर-चांपा जिले का हिस्सा है। जिला गजेटियर शिवरीनारायण नाम की उत्पत्ति को सवार नारायण के बिगड़े हुए रूप के रूप में बताता है, जिसका नाम एक बूढ़े सवारा के नाम पर रखा गया था जो जंगल में रहता था और जगन्नाथ की पूजा करता था। एक स्थानीय परंपरा 1 शहर को शबरी के जन्म स्थान से जोड़ती है, रामायण में उल्लेखित एक महिला भिक्षुक ने राम और लक्ष्मण को फल भेंट किए थे। वाल्मीकि (वाल्मीकि) की रामायण में राम की शबरी से मुलाकात का उल्लेख है, हालांकि यह उनकी वंशावली और उत्पत्ति के बारे में चुप है। महाकाव्य बताता है कि ऋषि मतंग (मतंग) ने अपनी मृत्यु-शय्या पर शबरी से कहा कि वह उनके आश्रम में रहें और राम (राम) और लक्ष्मण (लक्ष्मण) की प्रतीक्षा करें जो बहुत जल्द उनसे मिलने आएंगे। राम और लक्ष्मण ने दंडक वन में कबंध कबंध ने उन्हें बताया कि सभी ऋषिगण वहां से चले गए हैं, लेकिन एक शबरी उनका इंतजार कर रही है। राम और लक्ष्मण पंपा सरोवर पहुंचे और शबरी से मिले। जब उसने उन्हें देखा, तो वह दंडवत होकर उनके पैरों से लिपट गई। वह बहुत अभिभूत थी, बार-बार अपना सिर झुका रही थी। उसने उनके पैरों को पानी से धोया और उन्हें एक ऊंचा आसन प्रदान किया। फिर वह विभिन्न कंद, मूल और फल लाकर उन्हें अर्पित की, जिन्हें उन्होंने बार-बार खाया। शबरी ने भगवान राम से अनुरोध किया कि वह अपना शरीर छोड़कर उस स्थान में शामिल होना चाहती है जहां अन्य सभी महान ऋषि निवास करते रहे हैं। भगवान राम ने उसका अनुरोध स्वीकार कर लिया और उसे वांछित स्थान प्रदान किया। यहां शबरी का रामायण प्रकरण समाप्त होता है। एक स्थानीय परंपरा के अनुसार शबरी ने राम से अपने नाम के पहले उनके नाम, नारायण, के साथ जुड़ने के लिए कहा
मल्लिक बताती हैं कि सबरा (या शबर , सवारा आदि) मातृ देवी की पूजा करते थे, जिसका उल्लेख कई प्राचीन ग्रंथों में मिलता है। वे बलि अनुष्ठानों के साथ उनकी पूजा करने के लिए जाने जाते थे। उनका मानना है कि छत्तीसगढ़ क्षेत्र के आर्यनीकरण के दौरान, सबरा ने आक्रमणकारियों की मदद की होगी और उनके पक्ष में लड़ाई लड़ी होगी। उन्होंने नए समीकरण में एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त किया होगा, जिससे उनके स्थानीय देवताओं को आर्यन देवताओं के साथ आत्मसात करने का मार्ग प्रशस्त हुआ होगा। इस प्रकार, देवी शबरी राम के रूप में विष्णु के साथ जुड़ गईं। अगर हमें इस आर्यनीकरण सिद्धांत पर विश्वास करना है, तो स्थानीय देवताओं का आर्यन देवताओं में यह आत्मसात बहुत प्राचीन अतीत में हुआ होगा, और शिवरीनारायण की प्राचीनता को उस सुदूर अतीत में रखना मुश्किल होगा। सबरा एक प्राचीन जनजाति थी जिसका उल्लेख ऐतरेय ब्राह्मण, महाभारत, अर्थशास्त्र, अमरकोश, कादम्बरी, स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण आदि सहित कई प्राचीन ग्रंथों में किया गया है। इस जनजाति का उल्लेख विभिन्न विदेशी लेखों जैसे टॉलेमी और मेगस्थनीज 2 में भी मिलता है। कहा जाता है कि सबरा विंध्य पर्वतों के पास रहते थे। रसेल 3 ने 1911 में मध्य प्रांतों में लगभग 70,000 व्यक्तियों की संख्या वाली आदिम जनजाति के रूप में सावर का उल्लेख किया है , और मुख्य रूप से छत्तीसगढ़ जिलों और सौगोर और दमोह में पाए जाते हैं। जनजाति की पूर्वी शाखा मुख्य रूप से उरिया देश से संबंधित है। यह पूर्वी शाखा वर्तमान ओडिशा के साओरा हैं । स्थानीय परंपराएं जनजाति की उत्पत्ति शबरी से बताती हैं।
शिवरीनारायण का संबंध पुरी के भगवान जगन्नाथ से भी है। जगन्नाथ मूर्तियों की उत्पत्ति के पीछे विभिन्न सिद्धांतों में से एक शिवरीनारायण को मूल स्थान मानता है जहाँ मूर्तियों की पूजा की जाती थी। सबरा को भगवान जगन्नाथ से जोड़ने वाली किंवदंतियों के बारे में रसेल ने कुछ का उल्लेख किया है। एक किंवदंती में उल्लेख है कि सबरा को पुरी में महान मंदिर के निर्माण के लिए पत्थर ढोने और जगन्नाथ की गाड़ी को खींचने के लिए बनाया गया था, जो वे वर्तमान समय में भी करते हैं। एक अन्य किंवदंती में कहा गया है, " वे सवार नामक एक बूढ़े भील साधु के वंशज हैं, जो सेवड़ीनारायण से दो मील दूर खारोद में रहते थे। भगवान जगन्नाथ इस समय सेवड़ीनारायण में प्रकट हुए थे और बूढ़े सवार उनकी पूजा करते थे। उड़ीसा के लोगों ने पुरी में महान मंदिर का निर्माण किया था और उसमें जगन्नाथ को स्थापित करना चाहते थे ब्राह्मण ने व्यर्थ ही भगवान से मिलने की अनुमति मांगी और यहां तक कि अपनी बेटी से विवाह करने की भीख मांगी, और अंत में बूढ़े व्यक्ति ने उसे आंखों पर पट्टी बांधकर उस स्थान पर ले जाने की सहमति दे दी। हालांकि, ब्राह्मण ने अपने कपड़े के एक कोने पर सरसों के कुछ बीज बांधे और उसमें एक छेद कर दिया ताकि वे रास्ते में एक-एक करके गिरें। कुछ समय बाद वे बड़े हो गए और उसे उस स्थान तक ले जाने में मदद की। इसके बाद ब्राह्मण अकेले ही शिवनारायण गया और भगवान से पुरी जाने की विनती की। जगन्नाथ ने सहमति दे दी और लकड़ी के एक लट्ठे का रूप धारण करके महानदी में बहते हुए पुरी पहुंचे, जहां उन्हें बाहर निकाला गया और मंदिर में रखा गया।”
सामान्य शिलालेख - ये वे शिलालेख हैं जो किसी विशेष स्मारक से संबंधित नहीं होते हैं।
- रत्नदेव द्वितीय के सेओरीनारायण प्लेट्स - कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम खंड IV - कल्चुरी युग ( 1127 ई. ) के वर्ष 878 में दिनांकित - संस्कृत भाषा, नागरी अक्षर - अनुदान का उद्देश्य तिनेरी गांव के कलचुरी राजा रत्नदेव द्वितीय द्वारा दान को रिकॉर्ड करना है। चंद्र ग्रहण के अवसर पर. दान लेने वाला नारायणसरमन था, जो त्रिभुवनपाल का पुत्र और सिलादित्य का पोता था। रत्नदेव द्वितीय से लेकर उनके पिता जजल्लदेव प्रथम तक की वंशावली का उल्लेख है। जजल्लदेव प्रथम के हाथों कुछ बाला की हार का भी उल्लेख किया गया है।

नर-नारायण मंदिर (नर-नारायण मंदिर) - यह शहर का मुख्य मंदिर परिसर है और स्थानीय परंपरा के अनुसार इसका निर्माण राजा शबर ने करवाया था। परिसर के भीतर कई छोटे-बड़े मंदिर हैं। वर्तमान संरचना बहुत आधुनिक है और बाहर से देखने पर पुरातनता का कोई संकेत नहीं दिखता। हालाँकि गर्भगृह और उसका द्वार मूल संरचना का है जिसका निर्माण कलचुरी काल के दौरान हुआ होगा। जब आप मंदिर में प्रवेश करते हैं तो बाईं ओर गरुड़ पर सवार लक्ष्मी-नारायण की एक छवि है। छवि के ऊपर और नीचे विष्णु के दस अवतारों को दर्शाया गया है। मूर्ति को उचित सफाई की आवश्यकता है क्योंकि यह सिंदूर और अन्य समान सामग्रियों के निरंतर उपयोग के कारण बहुत खराब हो गई है।

गर्भगृह का द्वार बहुत ही उत्कृष्ट नक्काशीदार है। गर्भगृह के ठीक पहले मंडप की दो पार्श्व दीवारों पर शंख और चक्र आयुध-पुरुष (विष्णु के शंख और चक्र गुणों के मानवरूपी रूप) पाए जाते हैं। नदी देवियाँ, गंगा और यमुना, द्वार के चौखट पर अपने नियमित निचले स्थान पर हैं। उनके साथ द्वारपालों की एक जोड़ी भी है। द्वारपालों को चार हाथों में गदा (गदा) लिए हुए दिखाया गया है। चौखट के चारों ओर साँप और सर्प खुदे हुए हैं। विष्णु द्वार की चौखट के बीच में, ललाट-बिंब पर मौजूद हैं। गरुड़ पर सवार विष्णु की एक और छवि पिछले चौखट के ऊपर मौजूद है।





शिलालेख –
- शिवरीनारायण प्रतिमा शिलालेख – कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम खंड IV – कालचुरी युग ( 1146 ई. ) के 898 वर्ष में दिनांकित – संस्कृत भाषा, नागरी लिपि – यह शिलालेख एक पुरुष छवि के आसन पर है जो योद्धा प्रतीत होता है। शिलालेख शिव के आह्वान से शुरू होता है और बलासिमा और अमनदेवी के पुत्र संग्रामसिंह नामक योद्धा की छवि की स्थापना का उल्लेख करता है। शिलालेख को तलपसिंह नामक व्यक्ति ने उत्कीर्ण किया है।



केशव-नारायण मंदिर (केशव-नारायण मंदिर) - यह मंदिर नर-नारायण मंदिर के ठीक सामने स्थित है। इसे शबरी-दाई मंदिर भी कहा जाता है। मंदिर की मूल संरचना आंशिक रूप से बनी हुई है, इसकी छत और मंडप बच नहीं पाए हैं, वर्तमान में गर्भगृह और अंतराल ही बचा है। इस कारण इसे अधूरा मंदिर कहा जाता है, जिसे मूल रूप से एक रात में पूरा करने के लिए डिज़ाइन किया गया था, लेकिन योजना सफल नहीं हुई और मूर्तिकार भोर में ही चले गए। मंदिर विष्णु को समर्पित है, जो ललता-बिंब पर उनकी उपस्थिति से स्पष्ट है। उनके साथ ब्रह्मा और शिव भी टर्मिनल पर हैं, और बीच की जगह पर नव-गृह हैं।

लिंटेल के ऊपर नटराज की प्रतिमा है। ललता-बिंब पर छवि के बारे में अलग-अलग राय है। कुछ का मानना है कि यह विश्वकर्मा की छवि है, जबकि अन्य इसे विष्णु की छवि मानते हैं। द्वार पर चार पट्टियाँ खुदी हुई हैं। अंदर से दूसरी पट्टी में विष्णु के विभिन्न रूपों को रखने के लिए जगह है। गंगा और यमुना नीचे के दरवाज़े के चौखट पर मौजूद हैं। उनके साथ द्वारपाल भी हैं, जो दोनों तरफ़ दो-दो हैं। दरवाज़े के चौखट का साइड फेस भी खुदा हुआ है, हालाँकि यह केवल बाईं ओर ही बना है, दायाँ भाग अधूरा है, वास्तव में उन्होंने डिज़ाइन के मोटे स्केच को छोड़कर उस चेहरे पर कोई नक्काशी शुरू नहीं की थी।

गर्भगृह के अंदर केशव-नारायण के नाम से जानी जाने वाली विष्णु की एक छवि है। उन्हें चार हाथों के साथ दिखाया गया है, केवल एक हाथ बचा है जिसमें वे एक चक्र (चक्र) पकड़े हुए हैं। इस केंद्रीय छवि के चारों ओर विष्णु के दस अवतारों को दर्शाया गया है। उनके दाहिने पैर के पास रखी एक छोटी सी छवि को शबरी के रूप में जाना जाता है। हालाँकि, यह एक पुरुष की छवि है जिसे अंजलि-मुद्रा में अपने दोनों हाथ पकड़े हुए दिखाया गया है। यह किसी दानकर्ता या भक्त की हो सकती है।
चंद्रचूड़ मंदिर (चंद्रचूड़ मंदिर) - यह शिवरीनारायण का एकमात्र शिव मंदिर है और यह नर-नारायण मंदिर के पास स्थित है। यह संभवतः इस स्थल पर सबसे पुराना मंदिर है जैसा कि इस मंदिर में पाए गए एक शिलालेख से स्पष्ट है। हालाँकि मंदिर का काफी हद तक जीर्णोद्धार किया गया है जिससे इसकी सारी प्राचीनता छिप गई है।
शिलालेख –
- जाजल्लादेव II का शेओरीनारायण पत्थर शिलालेख - कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम खंड IV - कलचुरि युग ( 1167 ईस्वी ) के वर्ष 919 में दिनांकित - संस्कृत भाषा, नागरी अक्षर - शिलालेख चंद्रचूडेश्वर मंदिर में है, हालांकि बहुत क्षतिग्रस्त है। शिलालेख कल्चुरि राजाओं से लेकर जजल्लदेव द्वितीय तक की वंशावली सूची देता है । शिलालेख का उद्देश्य कल्चुरी राजवंश की एक सहयोगी शाखा के वंशज अमनदेव द्वारा चिनचेली गांव के दान और विक्कनदेव, जो अमनदेव के चाचा थे, द्वारा मंदिर के सामने एक दुर्गा मंदिर के निर्माण को रिकॉर्ड करना है। शिलालेख में चंद्रमा को कलचुरी राजवंश के पौराणिक पूर्वज के रूप में उल्लेख किया गया है, इसके बाद कोकल्ला प्रथम और उसके अठारह पुत्र आते हैं। इसके बाद कलिंगराज , रत्नराज प्रथम , पृथ्वीदेव प्रथम आते हैं । फिर शिवरीनारायण के पड़ोस में चोडगंगा पर विजय का उल्लेख है , हालांकि विजयी राजकुमार का नाम लुप्त है, लेकिन अन्य अभिलेखों से यह स्पष्ट है कि राजकुमार रत्नदेव द्वितीय था । उनके पुत्र पृथ्वीदेव द्वितीय थे , और उनके पुत्र जाजल्लदेव द्वितीय का उल्लेख है। . यह शिलालेख कलचुरियों की एक सहायक शाखा के बारे में महत्वपूर्ण जानकारी प्रदान करता है। सर्वदेव पृथ्वीदेव प्रथम का छोटा भाई था , जिसे सोंथिवा पैतृक हिस्से के रूप में मिला था। सर्वदेव ने सोंथिवा में एक शिव मंदिर और एक तालाब का निर्माण कराया। हालाँकि उसके बेटे का नाम खो गया है ऐसा लगता है कि यह अमनदेव प्रथम था । उसने राजदेव को जन्म दिया और बाद में उसके चार बेटे हुए, तेजलदेव , उल्हनदेव , गोपालदेव और विकनदेव । राजदेव ने पथरिया में एक तालाब के साथ एक शिव मंदिर का निर्माण कराया। हालांकि एक चेदि राजा की हार का उल्लेख है जिसके हाथों में यह था बहुत स्पष्ट नहीं है। इस युद्ध में एक राजकुमार की मृत्यु और उसके साथ उसकी तीन रानियों के सती हो जाने का भी उल्लेख है। मिराशी का सुझाव है कि चेदि राजा त्रिपुरी के जयसिंहदेव होंगे और इस युद्ध में मरने वाला राजकुमार उल्हनदेव होगा। हालाँकि कोई नाम स्पष्ट नहीं है। उल्हनदेव ने अमनदेव द्वितीय को जन्म दिया । उसे जजल्लादेव ने अपने बेटे की तरह प्यार किया था।
संदर्भ
1 मल्लिक, सिमा (2006)। वैष्णव पंथ में एक आदिवासी देवी (?): प्रारंभिक छत्तीसगढ़ में सबरी परंपरा, भारतीय इतिहास कांग्रेस की कार्यवाही में प्रकाशित खंड 66 (2005-2006)। पृ. 231-238
2 वही।
3 रसेल, आर.वी. (1916)। भारत के मध्य प्रांतों की जनजातियाँ और जातियाँ खंड IV । मैकमिलन एंड कंपनी लंदन। पृ. 500-503
4 छत्तीसगढ़ पर्यटन विवरणिका , 8 जून 2020 को प्राप्त की गई
आभार: ऊपर दी गई कुछ तस्वीरें तपेश यादव फाउंडेशन फॉर इंडियन हेरिटेज द्वारा जारी संग्रह से CC0 1.0 यूनिवर्सल पब्लिक डोमेन में हैं।
देश के नक्शे पर छत्तीसगढ़ कहाँ है?
देश के नक्शे पर छत्तीसगढ़ कहाँ है?
- विनोद साव
पर्यटन का जो भी मानचित्र देश में प्रकाशित हो रहा है, उसमें यह स्पष्ट है कि छत्तीसगढ़ का देश के महत्वपूर्ण पर्यटन स्थलों के बीच कोई स्थान नहीं बन पा रहा है। देश के हिन्दी और अंग्रेजी में प्रकाशित किसी भी पर्यटन साहित्य या गाइड पुस्तिका को देखें या पर्यटन स्थलों को दर्शाने वाले न शे को देखें तो उसमें छत्तीसगढ़ क्षेत्र के किसी भी स्थान को प्रमुखता से नहीं दर्शाया जा रहा है। कभी किसी न शे में भिलाई को एक औद्योगिक स्थल के रुप में दिखा दिया जाता है, या किसी पर्यटन पुस्तिका में बस्तर के माड़िया- मूड़िया आदिवासियों के बारे में संक्षेप में कुछ बता दिया जाता है। इन दोनों ही उदाहरणों से समूचे छत्तीसगढ़ प्रांत का देश के पर्यटन जगत में वह स्थान नहीं बनता जिसके लिए कोई पर्यटन स्थल जाना जाता हैं। हर साल देश भर सें देशाटन या तीर्थाटन के लिए निकलने वाले लाखों सैलानी और तीर्थयात्री अपनी यात्रा के लिए छत्तीसगढ़ की ओर उन्मुख नहीं हो पा रहे हैं।
देश का हृदय स्थल
..पर केवल पिकनिक स्पॉट :
देश का यह हृदय स्थल रहने बसने के लिए तो देश का स्वर्ग माना जाता है। इस मायने में कि यहां का वातावरण बड़ा शान्त और सहिष्णु है। अपनी आजीविका की खोज में देश के किसी भी हिस्से से यहां आने और फिर यहां बस जाने वालों के लिए तो यह सचमुच स्वर्ग है। पर पर्यटन की दृष्टि से घुमन्तू जीवन जीने वालों की प्राथमिकता में यह सबसे नीचे आने वाला प्रदेश है। राज्य के नवनिर्माण के आठ वर्षों में स्थिति आज भी वैसी ही है जबकि दो सिरमौर सत्तादल अपनी- अपनी ताकत दिखा गए हैं। अभी तक हालत यह है इस राज्य के दर्शनीय स्थल पर्यटन के विराट रुप को प्राप्त नहीं कर पाए हैं और मात्र पिकनिक स्पॉट बनकर ही रह गए हैं जहां सबेरे सबेरे टाटा सूमो में बैठकर घुम कड़ लोगों का एक समूह उतरता है और शाम-रात तक अपने घर वापस लौट जाता है।
घुमक्कड़ छत्तीसगढ़िया :
यह सही है कि छत्तीसगढ़ के लोग तीर्थ या़त्राएं बहुत करते हैं। और यहां गांवों से भी हर साल हजारों तीर्थयात्री देश के अनेक तीर्थस्थानों के लिए निकल पड़ते हैं। इनमें इलाहाबाद, बनारस, तिरुपति, रामेश्वरम, पुरी, गंगासागर, शिरडी और आजकल अमरनाथ जाने वालों की संख्या अधिक है। पर ऐसी ही तीर्थयात्रा या किसी भी प्रकार के पर्यटन के उद्देश्य से छत्तीसगढ़ आने वालों का कोई आंकड़ा खोजा जाए तो हमारा पर्यटन एवं संस्कृति विभाग बगलें झांकने लगेगा। शायद यही कारण है कि पर्यटन की आस और प्यास लिये छत्तीसगढ़ का जन मानस यात्रा के लिए बाहर जाने को हरदम एक पैर पर खड़ा रहता है। यात्रा के नाम पर खर्च करने में आगे यह नवप्रदेश वैसा ही है जैसा बंगाल और महाराष्ट्र। देश के किसी भी तीर्थस्थान पर गांव से आए छत्तीसगढ़िया लोगों के समूह को देखा जा सकता है। यहां हर घर के भगवान खोली (कमरे) में तिरुपति बालाजी और सांई बाबा के चित्र भी देखे जा सकते हैं।
विरासत में मिलीविकास की धीमी गति :
पर्यटन विकास की धीमी गति इस राज्य को विरासत में मिली है। यही हाल अविभाजित राज्य मध्यप्रदेश का था। जंगल, पहाड़ और कई प्राकृतिक स्थलों से समृद्घ रहने के बावजूद पर्यटन विकास में मध्यप्रदेश हमेशा ही एक पिछड़ा हुआ राज्य माना गया। पर्यटन के नाम पर यहां राज्य की नीति में कोई उत्साह उमंग कभी दिखा नहीं। पचमढ़ी, भे़डाघाट, खजुराहो, मांडवगढ़ और उज्जैन जैसे सुन्दर दर्शनीय स्थलों के होने के बाद भी कोई पर्यटन नीति न होने के कारण भी एक गरीब राज्य की छवि मध्यप्रदेश की बनी रही। कसम से आपने मध्यप्रदेश देखा ही नहीं जैसे दिलकश जुमले फेंकने के बाद भी देश का सबसे बड़ा यह राज्य पर्यटन विकास के मामले में सबसे पीछे ही रहा। जबकि इसके पास सतपु़डा और विंध्याचल जैसी खूबसूरत पहाड़ियॉ हैं। दो ज्योतिर्लिंग - महाकालेश्वर और ओंकारेश्वर हैं। इन्दौर, भोपाल, ग्वालियर, जबलपुर जैसे अपने समय के प्रसिद्घ और समृद्घ नगर रहे। उसके बाद भी पर्यटन सुविधाओं की दृष्टि से मध्यप्रदेश का बुरा हाल है तो छत्तीसगढ़ का या होगा जिसके पास मध्यप्रदेश के बराबर नैसर्गिक, पौराणिक और ऐतिहासिक सम्पदा नहीं है।
फिर भी छत्तीसगढ़ :
अलग हो जाने के बाद छत्तीसगढ़ को लगभग एक चौथाई भूखण्ड मिला है। जो छोटा राज्य हो जाने के बाद भी यह देश के क्फ् राज्यों से बड़ा राज्य माना जाता है। अब इस राज्य के जंगल से मिलने वाला राजस्व इतना तो है कि वह पर्यटन के लिए जितना संभव हो पाए, कर सके। अब यह राज्य अपना हिस्सा अलग पाकर इसके पर्यटन को किस तरह बढ़ावा दे सकता है यह इसके लिए एक बड़ी चुनौती होगी। प्राकृतिक संसाधनों की तो यहां कोई कमी नहीं है। राज्य की वन सम्पदा से प्राप्त भारी भरकम राजस्व शुल्क से अपनी विकास नीतियों के जरिये यहां के पर्यटन की संभावनाओं को तलाशना होगा। वर्तमान उद्योग नीति में पर्यटन को किस तरह से आय का जरिया बनाया जा सकता है, राज्य की इस व्यावसायिक दृष्टि को भी देखना होगा। योंकि दिनोंदिन पर्यटन उद्योग सारी दुनियां में पूंजी निवेश और आय का न केवल एक प्रमुख श्रोत बल्कि एक भारी भरकम व्यवसाय बनता जा रहा है।
क्या है छत्तीसगढ़ के पास :
वर्तमान स्थिति इस राज्य की यह है कि अपनी विरासत में मिली कमी के कारण इसके पास पहले से ही कोई बड़ा तीर्थस्थान या पर्यटन स्थल नहीं है। न कोई मुख्य धाम है यहॉं। बारह ज्योतिर्लिंगों में से एक भी ज्योतिर्लिंग इसके क्षेत्र में नही है। न ही समुद्र तट के यह किनारे बसा राज्य है। इसकी पर्वत श्रृंखलाओं में उतनी उंचाइयाँ और बर्फीली चोटियाँ नहीं हैं जिससे कोई हिल-स्टेशन प्रसिद्घ होता है। नदियां तो इस राज्य की बारहों माह बह नहीं पाती हैं उनकी धार टूटती रहती है। कई नदियां तो लगभग लुप्तप्राय स्थिति में हैं। यही वे प्राकृतिक संसाधन हैं जो किसी राज्य को पर्यटन की दृष्टि से महत्वपूर्ण बनाते है। यहां कोई मेट्रोसिटी या महानगर भी नहीं है जिसकी चकाचौंध लोगों को खींचती हो। रायपुर में अभी अभी खुले पहले मल्टीप्ले स शॉपिंग माल ने कुछ हलचल की है। रायपुर की व्यावसायिक महत्ता और परिवहन केन्द्र शुरु से ही उड़ीसा और आन्ध्रप्रदेश को अपनी ओर खिंचते रहे हैं।
या यह पर्यटन विहीन राज्यों में शामिल हो जावेगा :
अपने नैसर्गिक और भौतिक संसाधन होने के बाद भी देश के कई बड़े राज्य पर्यटन के मामले में बहुत पीछे चल रहे हैं। योंकि उनकी कोई सुनीति नहीं बन पाई है। कुछ तो पर्यटन विहीन हो गए हैं। इनमें उत्तर में हरियाणा, दक्षिण में आन्ध्रप्रदेश, पूर्व में गुजरात और पश्चिम में बिहार - ऐसे ही बड़े और पुराने राज्य हैं जिनकी पर्यटन उद्योग में कोई छवि नहीं बन पाई है। बिहार और झारखण्ड तो लगभग पर्यटनविहीन हो चले हैं। छत्तीसगढ़ की तरह इन राज्यों में भी पर्यटन विकास एक भारी चुनौती है। यहां भी देश भर से सैलानियों का आगमन नहीं होता। जब बिहार के विश्व प्रसिद्घ नालन्दा और बोधगया को देखने के लिए पर्याप्त सैलानी पहंुच नहीं पा रहे हैं तो छत्तीसगढ़ के सिरपुर और राजिम को देखने कौन आवेगा?
मिल जाता अगर अमरकंटक :
अमरकंटक एक ऐसा स्थान है जो मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ के सिवान पर आता है। यह शहडोल जिले और बिलासपुर जिले की सीमा पर बसा है। कई बार इसे भ्रमवश छत्तीसगढ़ के न शे पर दर्शा दिया जाता है। वैसे भी अमरकंटक में ज्यादा दर्शनार्थी छत्तीसगढ़ से ही पहुंचते हैं। छत्तीसगढ़ राज्य जब अलग बना तो मध्यप्रदेश के बालाघाट, मंडला और शहडोल जिले में अपने को छत्तीसगढ़ राज्य में ही शामिल कर लिए जाने की सुगबुगाहट थी। यह सुगबुगहाट अमरकंटक में और भी जोरों से थी योंकि अमरकंटकवासी शुरु से ही मध्यप्रदेश में अपने को उपेक्षित मानते रहे हैं। अमरकंटक का प्राकृतिक सौन्दर्य पचमढ़ी के जैसा होते हुए भी यहां सदैव सुविधाओं का अभाव रहा है। इसलिए भी मध्यप्रदेश के अन्य पर्यटन स्थलों की तुलना में अमरकंटक सबसे कमजोर बैठता था। जबकि छत्तीसगढ़ के पर्यटन स्थलों की तुलना अगर अमरकंटक से की जाए तो अमरकंटक ही सबसे महत्वपूर्ण हो जाएगा। आज भी अमरकंटक यदि छत्तीसगढ़ को दे दिया जाए तो इसका मान मनुहार सबसे ज्यादा होगा और यह छत्तीसगढ़ का सबसे अच्छा पर्यटन स्थल बन जाएगा। इसमें अमरकंटक और छत्तीसगढ़ दोनों का भला होगा।
कुछ बातें हैं छत्तीसगढ़ में :
बावजूद इन कमियों के छत्तीसगढ़ के पास जो प्राकृतिक संसाधन मौजूद हैं उनमें बस्तर, सरगुजा, बारनवापारा, उदन्ती और अचनाकमर ( जिसे अचानकमार भी कह दिया जाता है) जैसे वन प्रांतर हैं। चीतरकोट और तीरथगढ़ जैसे जलप्रपात हैं। केशकाल और कांगेर जैसी घाटियाँ हैं गंगरेल, हसदो-बांगो, खूंटा और तांदुला बांध जैसे विशाल जलाशय हैं। डोंगरगढ़, रतनपुर और राजिम जैसे मानता वाले तीर्थस्थल हैं। सिरपुर, मल्हार, और जांजगीर जैसे दुर्लभ पुरातत्व हैं। इनके संरक्षण संवद्र्घन और विकास का हल्ला तो होता ही रहता है। इन्हें आगे बढ़ाए जाने की मांग कभी जनमानस में होती है तो कभी जनप्रतिनिधियों में। सरकारी स्तर पर भी यदा कदा प्रयास किए जाते हैं। पर कुल मिलाकर कोई ऐसी तस्वीर नहीं बन पाती कि जिससे छत्तीसगढ़ देश भर से आने वाले सैलानियों के लिए आकर्षण का एक बड़ा केन्द्र बन जाय।
हो जाए कुछ टूर पैकेज :
इन सब दृष्टियों से देखा जाए तो छत्तीसगढ़ के कुछ स्थान तो बहुत ही आकर्षक हैं जहां पर्यटन विकास की अच्छी संभावनाएं हैं। इनमें चीतरकोट और तीरथगढ़ दो ऐसे जल प्रपात हैं जिनकी जोड का जलप्रपात देश में अन्यत्र कहीं देखने को नहीं मिलता। चीतरकोट (जिसका चलताउ नाम चित्रकूट या चित्रकोट है - पर बस्तर की हल्बी बोली में चीतरकोट है )। यह जलप्रपात देश के सबसे चौडे प्रपात के रुप में माना जाता है। पूरी की पूरी इन्द्रावती नदी यहां अपने जिस वैभव और गरिमामय रुप में नीचे गिरती है उसका सानी कहीं और देखने को नहीं मिलता। इसे रात्रि के फ्लड लाइट में देखना और भी रोमांचकारी लगता है। दूसरा जलप्रपात तीरथगढ़ है जो देश के सबसे उंचे झरनों मे से एक है। यह झरना झरझराते हुए बहुत उंचाई से लहराते हुए नीचे गिरता है। यह असंख्य जलबिन्दुओं की फुहार पैदा करता हुआ अपने आसपास कोहरे सदृश्य मनोरम दिखलाई देता है। नीचे गिरने के बाद यह कई चरणों में प्रपात बनाता हुआ चलता है। यह पचमढ़ी के प्रपातों की तरह फाल टू फाल ट्रैकिंग के लिए भी उपयु त झरना है। यह पर्यटकों के स्नान के लिए बहुत आनंददायक और सुविधाजनक है। यहीं कांगेर घाटी के आसपास कुटुम्बसर व कैलाश गुफाओं का अपना अद्भुत नजारा है। जगदलपुर को बेस सेन्टर बनाकर इसे एक अच्छे पैकेज का रुप दिया जा सकता है। एक बार हजार डालर वाला पैकेज बनाकर अंतर्राष्ट्रीय पर्यटकों को लुभाने की महत्वाकांक्षी कोशिश की गई थी जो असफल हुई। इसे फिर से व्यावहारिक बनाना होगा। उसी तरह छत्तीसगढ़ के दो वन प्रांतर अपने घने जंगलों और आरामदेह वातावरण के लिए प्रसिद्घ हैं - ये हैं बारनवापारा और उदन्ती के सुन्दर और सुरम्य वन। ये वन्यप्राणियों के लिए एक ऐशगाह है। जहां उन्हें उन्मु त जीवन जीते हुए देखा जा सकता है। विशेषकर बारनवापारा के पहाड़विहीन पठारी जंगल तो अद्भुत नजारा पेश करते हैं। इन दोनों ही जंगलों के बीच प की सड़कें भी खूब बनी हैं। जिनसे यहां पहुंचना और घूमना फिरना आसान है। यहां भ्रमण करने व आनंद उठाने के लिए एक आकर्षक पैकेज तैयार किया गया था जो बेहतर तालमेल के अभाव में बन्द हो गया। इसे आरंभ कर प्रचारित किए जाने की जरुरत है। उसी तरह सिरपुर अपने बौद्घकालीन पुरातात्विक वैभव के कारण अत्यंत महत्वपूर्ण है। इसे शायद वर्ड हैरिटेज में लिया भी गया है। महानदी के किनारे सिरपुर का फैला पसरा पुरातत्व अपने सम्पूर्ण वैभव के साथ उपस्थित है। यहां चाहें तो इनके इतिहास और पुरातत्व को व्याख्यायित करते हुए लाइट एंड साउण्ड शो का कार्यक्रम सप्ताह में दो दिन शनिवार, रविवार तथा अन्य छुटि्टयों के दिन चलाए जा सकते हैं।
रेल चली सरगुजा की ओर :
रेल चलाने का ज्यादा हल्ला हुआ था जगदलपुर के लिए। जिसमें रावघाट परियोजना से जोडते हुए दल्ली राजहरा रेल लाइन का विस्तार कर उसे जगदलपुर से जोडा जाए पर रेल चलवा लेने में बाजी मार ली अम्बिकापुर ने। जिसका परिणाम सामने आया दुर्ग-अम्बिकापुर ए सप्रेस। रात में दुर्ग से छूटने वाली इस ट्रेन में अम्बिकापुर के लिए आरक्षण आसानी से सुलभ है। सूर्योदय से पहले ही में सरगुजा की पहाड़ियों और जंगलों का दर्शन सम्मोहक दृश्य पैदा करता है। उस पर अम्बिकापुर का नया रेलवे स्टेशन किसी महल की तरह खूबसूरत बन पड़ा है। ऐसी कोई विशेष ट्रेन चलाकर सरगुजा का एक आकर्षक टूर पैकेज भी तैयार किया जा सकता है।
अरकू से आशा :
आन्ध्रप्रदेश की अरकू घाटी का नाम पिछले कुछ अरसों से पर्यटन स्थल के नाम पर चमका है। सैलानी उस तरफ आकर्षित हो रहे हंै। इससे यह साबित होता है कि दर्शनीय स्थान तो हर राज्य के पास हर तरह के होते हैं पर उनके भी उभरने के दिन आते हैं बशर्ते उस दिशा में कोशिश की जा रही हो। अरकू घाटी उसी रेल लाइन पर स्थित है जो विशाखापटनम से जगदलपुर व किरन्दुल जाती है। उस लाइन के कई सुरम्य स्थल छत्तीसगढ़ क्षेत्र में आते हैं। यह भी माना जाता है कि दुनियाँ में ब्रॉडगेज रेल लाइन का सबसे उंचा स्थान भी इसी लाइन पर स्थित है। जिस तरह पर्यटन के क्षेत्र में अरकू आगे बढ़ रहा है और उसे देखने के लिए देश के सैलानी आगे बढ़ रहे हैं उसी तरह छत्तीसगढ़ के भी दर्शनीय स्थलों को सामने लाया जा सकता है। इस तरह की कोशिशों के लिए छत्तीसगढ़ शासन के संस्कृति विभाग एवं छत्तीसगढ़ पर्यटन मंडल को जी-तोड मेहनत करनी होगी। इन सबके विकास और प्रचार के लिए विशेषज्ञों को लेकर रणनीति बनानी होगी, खूब खूब काम करना होगा। तब जाकर हम देश के दीगर इलाकों से सैलानी अपने राज्य में ला पाएंगे।
जानिए क्या होता है बस्तर का लांदा और सल्फ़ीजब भी बस्तर जाना होता है तब बस्तरिया खाना, पेय पदार्थ का स्वाद लेने का मन हो ही जाता है, चाहे, लांदा हो, सल्फ़ी हो या छिंदरस। बस्तर की संस्कृति पहचान ही अलग है। गत बस्तर यात्रा के दौरान अंचल के विशेष पेय पदार्थ एवं भोजन विकल्प सल्फी का रस तथा चावल का लांदा का स्वाद लिया गया। सल्फी का वृक्ष बस्तर अंचल में ही पाया जाता है. चावल को खमीर उठा कर उसका लांदा नामक पेय पदार्थ बनाया जाता है. हाट बाजार में ग्रामीण इसे बेचने आते हैं। भाई चंद्रा मंडावी लांदा बनाने की रेसीपी और तरीका बताते हुए कहते हैं, लांदा बनाने के लिये चावल को पीस कर उसके आटे को भाप में पकाया जाता है, इसे पकाने के लिए चूल्हे के ऊपर मिटटी की हांड़ी रखी जाती है जिस पर पानी भरा होता है और हांड़ी के ऊपर टुकना जिस पर चावल का आटा होता है। इसे अच्छी तरह भाप में पकाया जाता है, फिर उसे ठंडा किया जाता है। इसके पश्चात एक अन्य हंडी में पानी आवश्यकता अनुसार लेकर उसमे पके आटे को डाल देते है, साथ ही हंडी में अंकुरित किये मक्का (जोंधरा) के दाने, जिसे अंकुरित करने के लिये ग्रामीण रेत का उपयोग करते है। भुट्टे के अंकुरण के पश्चात उसे भी धुप में सूखा कर उसका भी पावडर बनाया जाता है। लेकिन इसे जांता (ग्रामीण चक्की) में पिसा जाना उपयुक्त माना जाता है। फिर इसे भी कुछ मात्रा में चावल वाले हंडी में डाल दिया जाता है। जिसका उपयोग खमीर के तौर पर किया जाना बताते है और गर्मी के दिनों में 2-3 दिन, ठण्ड में थोडा ज्यादा समय के लिए रख देते है। तैयार लांदा को 1-2 दिन में उपयोग करना होता है अन्यथा इसमें खट्टापन बढ़ जाता है। बस्तर में दुःख, त्यौहार या कहीं मेहमानी करने जाने पर भी लोग इसे लेकर चलते है। सल्फ़ी के विषय में बताते हुए चंद्रा मंडावी कहते हैं, वहीं सल्फी पेड़ का रस है, जो ताज़ा निकला मीठा होता है और दिन चड़ने के साथ इसमें भी कडवाहट आती जाती है। इसका उपयोग नशे के लिए तो किया जाता है पर सामाजिक क्रियाकलापों में इसकी भी भूमिका अहम् है।| इन दिनों सल्फी पेड़ की जड़ में एक बेक्टीरिया के संक्रमण के कारण सल्फी के पेड़ मर रहे है, जिस पर हमारे बस्तर के वैज्ञानिक शोध कर रहे है और जहाँ तक रोकथाम के उपाय भी खोज लिये गये है।
मीना बाज़ार का इतिहास एवं वर्तमाननगर में मीना बाज़ार लगा हुआ है, सांझ होते ही उदय भैया का मन मीना बाजार घूमने का करता है। यहाँ मनोरंजन के कई साधन जुटाए गए हैं।
जिसमें कई तरह के झुले, मौत का कुंआ, नाचने वाली सोलह साल की नागिन के साथ खिलौनों, टिकुली फ़ुंदरी की दुकान एवं खाने के लिए चाट पकौड़ी की दुकाने भी लगी हैं।
कुल मिलाकर बच्चों एवं महिलाओं के मनोरंजन का समस्त साधन जुटाया गया है। वैसे तो वर्तमान में मीना बाजार मेले-ठेलों में दिखाई देते हैं, परन्तु बरसाती खर्चा निकालने के लिए मीना बाजार वाले कस्बों का रुख कर लेते हैं।
भारत में मीना बाजार रजवाड़ों में लगाए जाते थे, जिसमें सिर्फ़ महिलाओं का प्रवेश ही होता था। रजवाड़ों की महिलाओं की सौंदर्य प्रसाधन एवं अन्य आवश्यकता की वस्तुओं की पूर्ति मीना बाजारों के माध्यम से की जाती थी।
आमेर के किले रनिवास में मीना बाजार लगने का उल्लेख मिलता है, जहाँ रनिवास की महिलाएँ, गहने गुंथे, चूड़ियां, कपड़े इत्यादि की खरीदी करती थी। इसके साथ ही मनोरंजन भी हो जाता था।
मीना बाजार नामकरण के पीछे प्रतीत होता है कि गहनों पर की जाने वाली मीनाकारी के नाम पर ही इसका नाम मीना बाजार पड़ा होगा।
इतिहास में पीछे मुड़कर देखें तो अकबर में काल में मीना बाजार बहुत बदनाम हुए। अकबर की काम लालसा ने दिल्ली में मीना बाजार लगवाना प्रारंभ किया, जिसमें सिर्फ़ स्त्रियों का ही प्रवेश होता था और बाजार की चौकीदारी के लिए तातारी महिलाएं नियुक्त कर रखी थी।
बाजार में आने वाली कोई भी महिला उसे पसंद आ जाती तो उठवा लिया करता था। बीकानेर के राव कल्याणमल की पुत्रवधु सिसौदिया वंश की किरण कुंवर से लात खाने के बाद उसने मीना बाजार की नौटंकी बंद की।
भोपाल में भी रिसायती दौर में मीना बाजार लगने की जानकारी मिलती है, जहाँ इसे परी बाजार कहा जाता था। ब्रिटेन की महारानी सन् 1909 में जब भोपाल आई तो प्रिंसेस ऑफ वेल्स क्लब की स्थापना हुई।
वर्ष 1916 में बेगम सुल्तानजहाँ ने महिला क्लब के माध्यम से मीना बाजार लगाया। बाजार में महिलाओं द्वारा निर्मित हस्तशिल्प सामग्री बिक्री के लिये रखी जाती थी उस दौर में मीना बाजार को परी-बाजार इसलिये कहा जाता था,
क्योंकि पढ़ी-लिखी बच्चियाँ सुंदर वस्त्र धारण कर परी के रूप में इन मेलों में भाग लेती थीं। पुराने भोपाल में आज भी एक मोहल्ला परी बाजार कहलाता है।
इस तरह अन्य स्थानों पर नवाबों द्वारा मीना बाजार लगाने का उल्लेख मिलता है। लखनऊ के कैसर बाग से लेकर पाकिस्तान के लाहौर तक मीना बाजार महिलाओं की आवश्यकता वस्तुओं की पूर्ति करते थे।
राजे रजवाड़े खत्म हो गए, परन्तु आज भी मीना बाजार चल रहे हैं, उनकी वही रौनक है, जो पहले हुआ करती थी। अब मेलों-ठेलों में मीना बाजार दिखाई देते हैं, जो एक स्थान से दूसरे स्थान तक सफ़र करते रहते हैं।
कई स्थानों के हाट अब स्थाई बाजारों में बदल गए, सूरत का चौटा बाजार, रायपुर की टुरी हटरी, बिलासपुर का गोलबाजार इस तरह सभी स्थानों पर स्थाई बाजार हो गए हैं।
भले ही मीना बाजारों के ढांचे में बदलाव आया है परन्तु मीना बाजारों को देखकर लगता है कि इतिहास की एक महत्वपूर्ण परम्परा हमारे बीच जीवित है।
खारुन नदी के संग-संग सफ़र: उद्गम से पदयात्राकभी आप वनों में उबड़-खाबड़ पथरीले रास्तो के साथ बहती किसी अल्हड़ सी नदी के साथ-साथ चले हैं? नहीं न। फ़िर आज चलते हैं प्राकृतिक सुषमा के बीचे वनों से आच्छादित भूधरा पर प्रवाहित सलिला खारुन नदी के साथ उसके उद्गम के सफ़र पर।  | | कंकालिन मंदिर पेटेचुवा |
खारुन नदी रायपुर शहर की जीवन रेखा है, जिसका सफ़र बालोद जिले के ग्राम पेटेचुवा से प्रारंभ होकर सोमनाथ में शिवनाथ से मिलन तक का है। नदी का उद्गम ग्राम पेटेचुवा के नायक तालाब से हुआ है। यहाँ इसे कंकालीन नाला कहा जाता है, जो आगे चलकर नदी का रुप धारण कर लेता है।  | | खारुन उद्गम नायक तालाब |
रायपुर से धमतरी होते हुए चारामा घाट से पहले दाँए तरफ़ मरकाटोला ग्राम से पेटेचुआ तक का सफ़र 115 किमी का है।  | | नदी के साथ साथ पदयात्रा का आरंभ |
इस छोटे से वनग्राम में कंकालीन माता का प्रसिद्ध मंदिर है। खारुन नदी कंकालीन मंदिर की चौहद्दी से लगकर खैरडिग्गी ग्राम तक का पांच किमी का सफ़र घने वन के बीच से तय करती है। इस पांच किमी का सफ़र विभिन्न पड़ावों से होकर गुजरता है, यह ट्रैकिंग रोमांचित कर जाती है एवं अद्भूत अनुभूति से भर देती है।  | | पदयात्रा के साथी, नारायण साहू, बन्नु राम |
जब हम नदी के साथ साथ यात्रा प्रारंभ करते हैं तब पहला स्थान भालू खांचा नाम का स्थान मिलता है। इस खांचा में बारहों महीने पानी रहता है, जिसका उपयोग भालू करते हैं।  | | खारुन नदी में भालू खांचा |
अगले पड़ाव में भकाड़ू डबरी मिलती है, यह छोटा सा तालाब है, जो पानी से लबालब भरा रहता है, इसके नामकरन के पीछे की कहानी रोचक है। मेरे साथी रामकुमार कोमर्रा बताए हैं कि गाँव में भकाड़ू नामक अविवाहित व्यक्ति रहता था। उसकी मृत्यु होने पर उसके रक्शा (कुंवारा प्रेत) बन जाने के डर से ग्रामवासियों ने दाह संस्कार के श्मशान में भूमि नहीं दी। तब वन में तालाब के किनारे उसके दाह संस्कार का निर्णय लिया गया, तब से इस तालाब का नाम भकाड़ू डबरी पड़ गया।  | | जंगल के मध्य भकाड़ू डबरी |
आगे बढने पर नदी के बीच चटान काट कर कोटना जैसी आकृति बनाने के कारण एक स्थान को कुकुर कोटना कहा जाता है, यहाँ कभी शिकारी कुत्ते पानी पीते थे। यहां हमने दोपहर के भोजन में गांव से बनाकर लाई हुई टमाटर की चटनी के अंगाकर रोटी का आनंद लिया।  | | दोपहर का भोजन कुकुर कोटना में |
अगला पड़ाव अइरी बुड़ान है, जहां मछली भोजन की तलाश में अइरी नामक चिड़ियों का डेरा रहता है। यहां एक स्थान ऐसा भी है जहाँ कि मिट्टी खारी है और उसे चाटने के लिए नीलगाय, चीतल, कोटरी आदि जानवर आते हैं, उनके खुरों के चिन्ह स्पष्ट दिखाई देते हैं।  | | अइरी बुड़ान |
अगला पड़ाव नाहर डबरी है, गहराई होने के कारण यहाँ नदी का पानी कुछ महीनो ठहर जाता है, जिसका उपयोग वन ग्राम नाहर के लोग करते हैं। यहां जंगल के खोदकर लाए हुए बेचांदी कांदा की प्रोसेसिंग की जाती है।  | | नाहर डबरी में बेचांदी कंद की प्रोसेसिंग |
इस यात्र का महत्वपूर्ण स्थान मासूल है, यहां नदी गहराई में उतर जाती है, ऊपर नीचे रखी बड़ी चट्टानें इमारत होने का भ्रम उत्पन्न करती हैं। यह स्थान इतना रमणीक है कि कुछ पल ठहरने का मन हो जाता है तथा भालूओं से भी भेंट हो सकती है। क्योंकि इनके रहने के लिए यह आदर्श स्थान है।  | | नदी का बीहड़ मार्ग |
इस स्थान का मासूल नाम धरने के पीछे की कहानी तिहारु राम सोरी बताते हैं, मासूल एक बड़ा और मोटा सर्प होता है, जो एक स्थान पर ही पड़ा रहता, उस पर दीमक चढ़ जाती है, फ़िर भी नहीं हिलता। जो उसके मुंह के सामने आ जाता है उसे खा लेता है। एक बार मछली पकड़ने वालों ने उसे लकड़ी का लट्ठा समझ कर उठा लिया और पानी रोकने के लिए आड़ के रुप में लगा दिया। पानी में मछली देख कर जब उसने हरकत की तब पता चला कि यह मासूल सर्प है, तब से इस स्थान का नाम मासूल प्रचलित हो गया।  | | मनोरम स्थल मासुल |
मासूल के आगे दोरदे नामक स्थान है, यहां से मछलियां नदी में ऊपर नहीं चढती। जंगल यहीं पर समाप्त हो जाता है और आगे खैरडिग्गी नामक गांव का खार लग जाता है। नदी का यह सफ़र आनंददायक है।  | | जोहर ले, सफ़र के साथी तिहारु राम सोरी |
जब भी यहां कि ट्रेकिंग करें तब ट्रेकिंग शुरु करने से पहले अपना वाहन खैरडिग्गी ग्राम में बुलवा लें, अन्यथा इसी रास्ते पर पुन: लौटना होगा। विशेष ध्यान रखे कि गांव के किसी जानकार व्यक्ति के साथ पर्याप्त भोजन पानी लेकर ट्रेकिंग करें। खारुन नदी की रोमाचंक पदयात्रावनांचल के निवासी निरंतर प्रकृति से जुड़े रहते हैं, नदी, पर्वत, वन एवं वन्य पशुओं के साथ अपनी संस्कृति एवं परम्पराओं के पोषक होते हैं। शुद्ध वायु के साथ हरियाली सेहत को बनाए रखती है। शहर का व्यक्ति भी प्रकृति से जुड़ना चाहता है, उसे देखना, समझना एवं परखना चाहता है, परन्तु जीवन की आपा-धापी में उसके पास भौतिक सुविधाओं की कमी नहीं है, परन्तु प्रकृति से जुड़ने के लिए समय नहीं है। फ़िर भी वह व्यस्ततम समय में से कुछ समय चुरा कर वनों की तरफ़ चल पड़ता है। कुछ ऐसा ही हाल मेरा भी है, मुझे जंगल, नदी, पर्वत हमेशा आकर्षित करते हैं और इनकी समीपता पाने का प्रयत्न करता रहता हूँ। समय मिलते ही निकल जाता हूँ प्रकृति को जानने, मानव संस्कृति समझने।  | | कंकालीन मंदिर पेटेचुआ |
इसी कड़ी में एक दिन खारुन नदी की ट्रेकिंग करने का ख्यान मन में आया। क्योंकि सभ्यताएँ, संस्कृतियाँ नदियों के किनारे ही पुष्पित पल्लवित हुई और उनका पतन भी हुआ। उनके अवशेष इन स्थानों पर मिलते हैं। खारुन नदी रायपुर शहर की प्राणदायिनी है। शहर में पेय एवं उद्योगों आदि के लिए इसी नदी से जल लिया जाता है। इसलिए तय हुआ कि खारुन नदी के उद्गम से संगम तक की पदयात्रा की जाए, इस पदयात्रा से खारुन द्वारा पोषित ग्रामों का इतिहास, संस्कृति एवं वर्तमान जान पाऊंगा।  | | खारुन उद्गम पेटेचुवा में नारायण साहू के साथ |
अब बारी थी योजना को अमलीजामा पहनाने की। नये स्थान से पदयात्रा प्रारंभ करना और जहाँ कोई पहचान का भी न हो तो काफ़ी कठिन कार्य हो जाता है, यदि स्थानीय निवासियों का सहयोग न मिले तो। इस विषय में एक दिन मैने मित्र नारायण साहू से चर्चा की, वे तैयार हो गए। मैने तय किया था कि उद्गम तक मोटर सायकिल से जाएंगे। परन्तु नारायण साहू ने कहा कि कार से चलेंगे। मामला फ़िट हो गया और अगले दिन सुबह हम खारुन के उद्गम की ओर चल दिए। खारुन का उद्गम पेटेचुवा ग्राम में है, जिसे स्थानीय लोग कंकालीन भी कहते हैं। रायपुर से पेटेचुआ की दूरी 115 किमी है। चारामा घाट के नीचे से मरका टोला नामक ग्राम है, यहाँ से पेटेचुवा लगभग तीन-चार किमी की दूरी पर है।  | | खारुन नदी |
हमने ठंड से बचने का सामान ले लिया था, परन्तु ओढने एवं बिछाने के सामान का ध्यान नहीं रहा। इसकी जरुरत वहाँ पहुंचने पर पता चली। पेटेचुवा हम दोपह्रर को पहुंचे, कंकालीन माता के मंदिर के समीप गाड़ी खड़ी की। मंदिर के समीप ही सायकिल पंचर बनाने की एक दुकान एवं छोटा सा चायपानी का होटल था। इस ग्राम में हम पहली बार आए थे, इसलिए कोई पहचान का नही था।  | | मंदिर परिसर का भीतरी पैनारामा दृश्य |
होटल में चाय बनवाई और चाय पीते हुए खारुन नदी के उद्गम की चर्चा की। सायकिल दुकान वाला हमें खारुन नदी के उद्गम पर ले जाने के लिए तैयार हो गया। उसके साथ हम पैदल चलकर नायक तालाब पहुंचे, इस तालाब से झरिया से पानी निकलता है, जो खेतों से बहते हुए आगे चलकर कंकालीन नाले का रुप ले लेता है। यह नाला मंदिर के दाईं तरह से होकर जंगल में चला जाता है और मैदान में पहुंच कर खारुन नदी नाम पाता है।  | | खारुन नदी के प्रारंभ स्थल पर |
तालाब बहुत बड़ा था, मंदिर के पुजारी रामकुमार ने बताया कि इस तालाब का रकबा सत्रह एकड़ है। पुरखे बताते थे कि इसका निर्माण नायक लोगों ने कौड़ी पैसे में कराया था, पहले इस जगह पर एक झरिया था, जिसमें पेड़ का खोल गाड़ा हुआ था, ग्रामवासी उसी जल से अपना निस्तार करते थे। प्राचीन काल में नायक बंजारे अपनी गाड़ियों में सामान भर कर बेचने आते थे। उनके काफ़िले के लिए पानी की जरुरत पड़ती थी,
 | | नायक तालाब पेटेचुवा, इसी तालाब से खारुन नदी का उद्गम हुआ |
पानी की जरुरत को पूरा करने के लिए उन्होंने गांव वालों को मजदूरी देकर इस तालाब का निर्माण कराया, जिसके कारण इसे नायक तालाब कहा जाता है। रामकुमार की बातों से पता चला कि यह तालाब प्राचीन है। छत्तीसगढ़ में अन्य स्थानों पर भी बनजारों ने तालाबों का निर्माण कराया। अभनपुर के जनपद के एक ग्राम का नाम ही नायकबांधा है। अवश्य ही इसका संबंध नायकों द्वारा बनवाए गए तालाब से ही है। इसके बाद मुझे नायकबांधा नामक एक अन्य ग्राम महासमुंद के समीप भी मिला तथा पिथौरा में नायक लोग अभी भी रहते हैं।  | | नायक तालाब का निरीक्षण करते हुए |
कंकालिन मंदिर से खैरडिगी ग्राम की दूरी लगभग सात किमी है। इस सात किमी में सघन वन है, इसके बाद मैदानी क्षेत्र प्रारंभ हो जाता है। हमारी नदी ट्रेकिंग का यही कठिन हिस्सा था। इसलिए हमने ट्रेकिंग को अगले दिन पर टाल दिया और रात के खाने का सामान लेने गुरुर ग्राम चले गये। हमारे साथ धमतरी से सुनील बरड़िया भी आये थे, उन्हें भी गुरुर से धमतरी वापसी के लिए बस पकड़वा दी। हम रात का खाना लेकर कंकालीन लौट आये
भालु खांचा: खारुन नदी की रोमांचक पदयात्राकंकालीन मंदिर में पक्का हाल भी बना हुआ है, वहाँ रात काटने के लिए हमने रामकुमार से चर्चा की तो वह हमें स्थान देने के लिए तैयार हो गया और एक दरी हमारे सोने के लिए भी बिछा दी। रात बातचीत करते हुए सुबह का कार्यक्रम बनाते हुए गहरी होती गई।  | | सफ़र का साथी पोयाम |
लगभग बारह बजे के बाद नींद आई। सुबह की चाय के लिए मैने रामकुमार से कह दिया था। सुबह के खाने के लिए मैने रामकुमार कोमर्रा को घर से अंगाकर रोटी और टमाटर की चटनी बनाने के लिए रुपए दे दिए। ग्राम के तीन चार लोग हमारा मार्ग दर्शन करने के लिए तैयार हो गए।  | | दोपहर का भोजन अंगाकर रोटी |
इस यात्रा में मेरा एक साथी बना बन्नु सिंह उकै। इसके पास छ: एकड़ की किसानी एवं बीबी-बच्चे सब हैं, पर घुमक्कड़ जीवन व्यतीत कर रहा है। भोजन बनाने के लिए जर्मन के दो बर्तन, एक लाल रिफ़िल का पेन, फ़ुल स्केप का पेपर, थैली में तम्बाखू चूना की पुड़िया तथा चिलम ही इसकी कुल सम्पत्ति है। जिसे हमेशा साथ रखता है। सुबह हमारी नींद खुली तो बन्नु राम ने नदी के किनारे चूल्हा बना एवं जलाकर गुड़ की लाल चाय पिलाई। चाय पीकर तबियत तर हो गई क्योंकि मुझे सुबह की चाय की आवश्यकता होती है। उसके बाद दिन भर चाय की कोई दरकार नहीं। लगा कि बिगबॉस का लक्जरी आयटम मिल गया।
 | | बन्नु सिंह ऊकै |
हम लोगों के दैनिक कार्यों से निवृत्त होते तक बन्नु सिंह नदी में नहाकर आ गया और उसने चूल्हे में राहर दाल बनने के लिए चढा दी थी। मेरे लिए आंवला वृक्ष की दातौन तोड़ लाया। मेरे दातौन मुखारी करते तक भोजन तैयार हो गया। भोजन करने से पहले उसने बालों में तेल लगाया और डबरा के जल में चेहरा देखकर जुल्फ़ों को संवारा। फ़िर लहसुन, टमाटर एवं मिर्च का तड़का देकर दाल फ़्राई की। जिस सलीके से उसने सीमित संसाधन में भोजन तैयार किया उससे लगा कि बन्नु सिंह भोजन का शौकीन है।
 | | खारुन नदी पदयात्रा प्रारंभ |
सुबह छ: बजे रामकुमार अपने साथियों के साथ आ गया, साथ में बड़ी-बड़ी तीन अंगाकर रोटी एवं टमाटर मिर्च की चटनी भी लाया। रोटी के एक टुकड़े का नाश्ता करके हम ट्रेकिंग पर चल पड़े। कंकालीन मंदिर से पथरीला उबड़ खाबड़ क्षेत्र प्रारंभ हो जाता है। हम नदी के साथ-साथ ही चल रहे थे। जंगल के भी अपने नियम और कायदे होते हैं। यहाँ अनजान आदमी तो चक्कर काटते ही रह जाएगा।  | | सुबह तालाब का दृश्य |
जिस तरह शहरों में गली मोहल्लों को नाम रख कर चिन्हित किया जाता है उसी तरह जंगल में स्थानीय ग्रामीण स्थानों को विभिन्न नामों से चिन्हित करके रखते हैं, यही चिन्ह जंगल में रास्ता न भूलने में सहायक होते हैं। बन्नु सिंह बड़ा ही फ़क्कड़ एवं मस्त मलंग है, इसके साथ नदी के आस-पास देखते हुए बात चीत करते रास्ता कट रहा था।  | | यात्रा मार्ग में भालु खांचा - यहाँ बारहो महीने पानी रहता है। |
प्राकृतिक वनों विभिन्न प्रजाति के पेड़ पौधे एवं वनस्पति होती हैं। जिन्हें जंगल का आदमी बराबर पहचानता है और स्थानीय भाषा में उसका नाम रखकर चिन्हांकित कर लेता है। कुछ दूर चलने पर पथरीली धरती पर एक स्थान पर चारों तरफ़ से पानी आकर जमा होता है। इसे भालू खांचा नाम दिया गया है। जंगल में जब पानी की कमी हो जाती है तो भालु इस खांचे में आकर पानी पीते हैं भकाड़ू डबरी: खारुन नदी की रोमांचक पद यात्राभालु खांचा से आगे बढने पर घना जंगल प्रारंभ हो जाता है, पेड़ों पर लटकती लताओं की बेलें मोटी हो जाती हैं। दीमक की बांबियाँ आठ-दस फ़ुट ऊंची हो जाती हैं। इन बांबियों में सांपों का बसेरा रहता है और भालू भी इनके आस पास दीमकों की तलाश में पहुंचते हैं।  | | पदयात्रा दल: लगभग दस फ़ुट ऊंची बांबी के साथ |
नदी अब चट्टानों के बीच से होकर बहने लगती है। नदी के मार्ग में बड़े बड़े बोल्डर दिखाई देने लगते हैं। बोल्डरों पर से होकर चलना कठिनाई भरा था। पैर फ़िसलने पर चोट लगने की आशंका बढ जाती है। इसलिए चाल धीमी हो गई और हर कदम जमीन देख कर रखना पड़ रहा था।  | | भकाड़ू डबरी |
आगे बढ़ने पर एक तालाब दिखाई दिया। पूछने पर बन्नु सिंह ने बताया कि इसे भकाड़ू डबरी कहते हैं। इसका निर्माण जंगलात वालों ने वन्य पशुओं के पानी पीने के लिए बनाया है। नामकरण के पीछे की कहानी पूछने पर रामकुमार ने कहा कि हमारे गाँव में निषाद जाति का भकाड़ू नाम व्यक्ति रहता था। उसका विवाह नहीं हुआ। गांव में अविवाहित आदमी की कोई कदर नहीं होती और भले ही न हो, पर उसे हमेशा नीयतखोर समझा जाता है।  | | भकाड़ू डबरी में धुंए के छल्ले बनाता बन्नु सिंह |
भकाड़ू की वृद्धावस्था में मृत्यु हो गई तो गांव वालों ने उसके दाह संस्कार के लिए गांव में जगह नहीं थी। जगह न देने की पीछे डर था कि मरने बाद वह रक्सा (कुंवारा प्रेत) बनकर गांव वालों को हलाकान करेगा। गांव वालों ने सहमति से इस तालाब के किनारे उसका दाह संस्कार किया। तब से इस तालाब को भकाड़ू डबरी कहा जाता है।  | | नदी में बेचांदी कांदा प्रसंस्करण: नाहर डबरी |
बातचीत करते हुए हम संभल कर चल रहे थे। आगे चलकर नदी का पाट थोड़ा चौड़ा हो जाता है, दोनों किनारों पर बड़ी बड़ी चट्टाने हैं। इस जगह पर नदी का पानी थोड़ी गहराई लिए हुए ठहरता है। दूर से हमें कुछ लोग नदी के किनारे कुछ चमकीली सी चीज धोते हुए दिखाई दिए। समीप पहुंचने पर देखा कि ये लोग एक कंद की चिप्स बनाकर धो रहे थे। इस काम में चार पांच परिवार लगे हुए थे। चिप्स को धो कर चट्टानों पर सुखाया हुआ था। इस स्थान को नाहर डबरी कहते हैं।  | | बेचांदी कांदा की चिप्स धोते हुए |
यहां हमारी भेंट तिहारु राम सोरी से हुई। उनका परिवार भी कंद का प्रसंस्करण कर रहा था। उसने इस कंद का नाम बेचांदी कांदा बताया तथा कहा कि इसमें बहुत नशा होता है। अगर इस कंद का गेंहूं के बराबर का दाना किसी को खिला दिया जाए तो उसके मांस पेशियां जाम हो जाती है अत्यधिक नशे में व्यक्ति शिथिल हो जाता है।  | | नाहर डबरी: खारुन पदयात्रा |
डाक्टरी इलाज से भी इसका नशा नहीं उतरता। जब इसके नशे की मियाद पूरी होती है तो स्वत उतरता है। इस कंद के चिप्स बनाकर ये बाजार में ले जाते हैं, जहाँ व्यापारी दवाई बनाने के लिए अस्सी रुपए किलों में खरीदते हैं। यहाँ आधे घंटे विश्राम कर हमने जल ग्रहण किया। अब हमारे दल में तिहारु राम भी जुड़ चुके थे।  | | अइरी बुड़ान |
उबड़ खाबड़ चट्टानों पर चलना दुखदाई भी था, परन्तु आगे की सोच कर रोमांच भी हो रहा था। यही रोमांच हमें आगे खींच कर ले जा रहा था। आगे चलकर अरई बुड़ान नामक स्थान आया। यहाँ पर नदी की धार में एक छोटा सा रेतीला टीला है, जिसके आस पास काफ़ी जानवरों के खुरों के चिन्ह दिखाई दिए।  | | नमकीन मिट्टी: यहां जानवर नमकीन मिट्टी चाटने आते हैं। |
इस स्थान की मिट्टी नमकीन है, जिसे चाटने के लिए वन्य पशु आते हैं। इस स्थान पर मछलियां भी खूब मिलती है, इसलिए अइरी नामक पक्षी भोजन की तलाश में डेरा डाले रहते हैं। अइरी पक्षी के नाम पर इस स्थान का नाम अइरी बुड़ान हो गया।
कलचुरीकालीन छत्तीसगढ़ का गढ़ मोंहदीगढ़कई विद्वानों का मत है कि मध्यकाल में कलचुरीकालीन छत्तीसगढ़ों को लेकर छत्तीसगढ़ का निर्माण हुआ। ये गढ़ कलचुरी शासन काल में प्रशासन की महत्वपूर्ण इकाई थे। कालांतर में कलचुरी दो शाखाओं में विभक्त हुए, शिवनाथ नदी के उत्तर में रतनपुर शाखा एवं दक्षिण में रायपुर शाखा का निर्माण हुआ।  | | मोंहदीगढ़ के पठार की ओर ले जाती पैड़ियाँ |
ये गढ़ इस प्रकार हैं - रतनपुर के १८ गढ़ : रतनपुर, उपरोड़ा, मारो, विजयपुर, खरौद, कोटगढ़, नवागढ़, सोढ़ी, ओखर, पडरभट्ठा, सेमरिया, मदनपुर, कोसगई, करकट्टी, लाफा, केंदा, मातीन, पेण्ड्रा एवं रायपुर के १८ गढ़ : रायपुर, पाटन, सिमगा, सिंगारपुर, लवन, अमेरा, दुर्ग, सारधा, सिरसा, मोहदी, खल्लारी, सिरपुर, फिंगेश्वर, सुवरमाल, राजिम, सिंगारगढ़, टेंगनागढ़, अकलवाड़ा।  | | मोंहदीगढ़ का पठार |
समय ने करवट ली और कलचुरी राज का पतन हो गया। मराठों ने रायपुर शाखा के अंतिम शासक अमरसिंह की मृत्यु के पश्चात उनके पुत्र शिवराज सिंह को पांच गाँव (बड़गांव, मुढेना, भलेसर, गोईंदा, नांदगाँव) माफ़ी के देकर एवं पुर्वजों के प्रत्येक गांव से एक रुपया खर्च देकर इनका अधिकार समाप्त कर दिया।  | | ऊपर चढे चलो भाई |
वर्तमान में इन कलचुरियों के वंशज महासमुंद जिले के इन पांच गांवों में निवास करते हैं। इनके विषय में वैसे तो मुझे पूर्व में भी जानकारी थी। परन्तु कलचुरी वंशजों से मिलना कल हुआ। लाल विजय सिंहदेव एक अरसे से मेरे फ़ेसबुक मित्र थे, परन्तु इनसे कभी मिलना, भेंटना नहीं हुआ था। कल महासमुंद से इनसे मुलाकात हुई। सरल स्वभाव के उर्जावान युवक हैं और अपने इतिहास एवं धरोहरों के प्रति भी जागरुक दिखाई दिए।  | | रायपुर कलचुरी वंशज लाल विजय सिंह देव |
सुबह इनके साथ रायपुर शाखा के अठारह गढ़ों में से एक मोंहदीगढ़ जाना हुआ। यह महासमुंद से खल्लारी मार्ग पर 12 किमी की दूरी पर मोंहदी नामक ग्राम की डुंगरी पर है। यहाँ गढीन माई (चम्पई माता) का स्थान है। जिन्हें आस पास के ग्रामीण अपनी आराध्या मानते हैं और पूजन करते हैं। मोंहदी ग्राम के सरपंच खेमराज दीवान हैं, जो गौंटिया परिवार से ही हैं। इनके साथ हमने गढीन दाई के दर्शन एवं गढ के अवशेषों की खोज में डुंगरी पर चढाई की।  | | मोंहदी सरपंच खेमराज दीवान |
डुंगरी के शीर्ष पर पढार है, इससे जुड़ा हुआ अमली पठार भी है और उपर से बेलर गांव की तरफ़ जाने का रास्ता भी है। वर्तमान में हुए निर्माणों के अलावा अन्य प्राचीन निर्माण के अवशेष यहाँ दिखाई नहीं देते। परन्तु डुंगरी में सुरंग एवं गुफ़ाएं होने की कथा सुनाई देती है। ऐसी एक सुरंग नुमा खोह में चम्पई माता विराजित हैं। अनगढ़ पाषाण की यहाँ दो प्रतिमाएँ हैं, जिनमें आँखे जड़ी हुई हैं। नवरात्रि के अवसर पर यहाँ ज्योति जलाई जाती है और मेला भी भरता है।  | | मोंहदीगढ़ की कंदराएँ |
यहाँ से पठार पर चलकर बेलर गांव के रास्ते में एक मानव निर्मित प्रस्तर भित्ति जैसी संरचना दिखाई देती है। जहाँ स्थानीय देवता विराजमान हैं। इसके अतिरिक्त अन्य कुछ दिखाई नहीं देता। अधिक जानकारी एवं शोध के लिए डुंगरी का चप्पा चप्पा छानना होगा। हो सकता है कि प्राचीन मानव बसाहट के चिन्ह मिल जाएं।  | | झुरमुटों के बीच से रास्ता |
समय कम होने के कारण मैं यह कार्य नहीं कर सका। डुंगरी से नीचे उतरने पर एक फ़र्लांग की दूरी पर दस पन्द्रह घरों की प्रस्तर नींव दिखाई देती है, जिससे लगता है कि कभी यहाँ मानव की बसाहट रही होगी। सरपंच खेमराज ने बताया कि यहाँ पर एक प्राचीन कुंआ भी है।  | | चम्पई माता मोंहदीगढ़ |
वैसे छत्तीसगढ़ में मोंहदी नामक कई गांव मिलते हैं, परन्तु भौगौलिक परिस्थितियों को देखने पर प्रतीत होता है कि यही स्थान मोंहदीगढ़ रहा होगा। क्योंकि खल्लारी, सुअरमाल, फ़िंगेश्वर, सिरपुर आदि गढ़ इसके आस पास ही हैं। इस यात्रा के लिए लाल विजय सिंहदेव का आभार। फ़िर कभी समय एवं अवसर मिला तो इस क्षेत्र की तपास की जाएगी
तीरथगढ़ जलप्रपात बस्तरबड़े बूढे कह गए हैं कि जल, वायू और अग्नि से कभी खिलवाड़ नहीं करना चाहिए और न ही इनकी शक्ति को कम करके आंकना चाहिए। खासकर बरसात के दिनों में नदी, नालों, झरनो में वर्षा जल कब बढ़ जाए इसका पता नहीं चलता। नदी किलोमीटरों दूर से बहकर आती है इसलिए अगर 25 किलोमीटर दूर मुसलाधार वर्षा हो रही हो और आप जहाँ है वहाँ वर्षा न हो रही हो तो नदी का जल तेज गति से आकर आपको घेर सकता है। इसलिए नदी, नालों एवं झरनों में अतिरिक्त सावधानी बरतनी चाहिए।  | | तीरथगढ़ जलप्रपात बस्तर |
अब बात करते हैं तीरथगढ़ जलप्रपात की, यह जल प्रपात जगदलपुर की दक्षिण-पश्चिम दिशा में 35 किमी की दूरी पर स्थित है। तीरथगढ़ की ऊंचाई 300 फ़ुट होने के कारण यह भारत के सबसे ऊँचे झरनों में से एक है। कुछ दिनों पूर्व हम तीरथगढ़ जलप्रपात घूमने चले गए। गहराई में उतरने से पहले हम ऊपर से ही फ़ोटो लेने लगे, तभी बारिश आ गयी। हम लोगों ने वहीं पर बनी एक जर्जर ईमारत की शरण ली। वहाँ से देखा कि कुछ लोग झरने में नीचे उतरे हुए हैं और बारिश होने के कारण वहीं पर बनी एक छोटी सी पुलिया के नीचे घुस गए।  | | तीरथगढ जलप्रपात बस्तर में पुलिया के नीचे लोग |
उनके हाथ में मोबाईल था जिससे खेलते हुए बारिश रुकने का इंतजार करने लगे। बारिश रुकने पर हम नीचे गए और अच्छी लोकेशन देख कर कुछ चित्र लिए। बस्तर में मानसून पहुंचने के कारण पिछले 48 घंटों तक लगातार बारिश हुई। जगदलपुर से बैंक ऑफ़ इंडिया के मैनेजर के परिवार के 4 सदस्य अपरान्ह 3 बजे तीरथगढ़ पहुंचे और जलप्रपात में नीचे उतर गए। उन्हें पहुंचे 15 मिनट ही हुए थे कि बरसात शुरु हो गयी, तो वहां के मंदिर के पुजारी ने बारिश से बचने के लिए उन्हें अपने पास बुला लिया। इसके बाद जो मुसलाधार बारिश शुरु हुई कि रुकने का नाम ही नहीं लिया।  | | तीरथगढ़ जलप्रपात में रेस्क्यू ऑपरेशन |
झरने में जल का स्तर बढ़ने से वे टापू पर फ़ंस गए और वापस भी नहीं आ सकते थे। मोबाईल का नेटवर्क भी नहीं बता रहा था। किसी तरह थोड़ा नेटवर्क आने पर उन्होने अपने परिचित फ़ोन किया और उन्होने पुलिस को। पुलिस की रेस्क्यू टीम वहां रात को पहुंच गई। लेकिन जल का बहाव तेज होने के कारण कार्यवाही करने में अक्षम हो गई। उन्होने सुबह होने का इंतजार किया। 16 घंटे मौत के साये में गुजारने के बाद उन्हें पुलिस की रेस्क्यू टीम ने बचाया। इसलिए बारिश के मौसम में नदी, नालों एवं झरनों में अतिउत्साह में खतरा मोल न लें।
अभनपुर जंक्शन: सवा सौ बरस पुरानी रेलरायपुर से चलनी वाली छुकछुक रेलगाड़ी (नेरोगेज) वर्तमान में राजिम एवं धमतरी तक का सफ़र तय करती है। देश में अन्य स्थानों पर तो अमान परिवर्तन हो गया परन्तु हमारे यहाँ अभी भी चल रही है। पहले स्टीम इंजन था अब डीजल इंजन चलता है। रायपुर राजधानी बनने के बाद इस ट्रेन के यात्रियों में बेतहाशा वृद्धि हुई। राजधानी में नवनिर्माण होने लगे तो धमतरी एवं राजिम से काम करने के लिए कम खर्च में इसी ट्रेन से रायपुर तक का सफ़र तय करते हैं। यह ट्रेन अपनी शताब्दी पूर्ण कर चुकी है। यह क्षेत्र वन सम्पदा से भरपूर था और उसके दोहन के लिए अंग्रेजों ने रेल लाईन बिछाई।  इस मार्ग पर 1896 में 45.74 मील लंबी रेल लाइन बनाने का काम शुरू हुआ, जो 5 साल बाद 1901 में पूरा कर लिया गया। यह रेल लाइन ब्रिटिश इंजीनियर एएस एलेन की अगुवाई में में बनाई गई। छत्तीसगढ़ में अकाल के दौरान ग्रामीणों को रोजगार देने के नाम पर इस रेल लाईन का निर्माण किया गया। बताते हैं कि धमतरी मार्ग पर नगरी तक रेल पटरियां बिछाई गई और राजिम मार्ग पर गरियाबंद के जंगलों तक। इसके परिचालन के लिए महानदी पर लकड़ी का पुल बनाया गया। तब कहीं जाकर यह ट्रेन गरियाबंद के जंगलों तक पहुंची। इस ट्रेन के माध्यम से वन संपदा का दोहन युद्ध स्तर पर किया गया। पहले इसे ग्रामीण "दू डबिया गाड़ी" कहते थे। शुरुवाती दिनों में इसमें दो डिब्बे लगाकर ही चलाया जाता था। ग्रामीण इसके इंजन की सीटी सुन कर समय का पता लगाते थे। इसमें भाप का ईंजन 1980 तक चला। इसके बाद डीजल के इंजन लगे और सफ़र थोड़ी अधिक गति से होने लगा। 
सैकड़ों साल पहले रेल परिचालन किस तरह से होता है अगर यह जानना है तो इस छोटी ट्रेन का सफ़र करना चाहिए। यातायात के उसी साधनों का प्रयोग आज भी किया जाता है जो सैकड़ों साल पहले किया जाता था। ट्रेन का ड्रायवर आज भी गोला बंधा रिंग फ़ेंकता है जिसे लोहे की मशीन में डाल कर दो बड़ी चाबियाँ लगा कर फ़िर फ़ोन किया जाता है तब लाईन क्लियर की जाती है। सड़क मार्ग के गेट आज उन बड़ी चाबियों से खुलते हैं। इस मार्ग पर अभनपुर महत्वपूर्ण जंक्शन है। यहाँ से राजिम एवं धमतरी के लिए रेलमार्ग पृथक हो जाता है। स्टेशन पर आज भी वैसा ही है जैसा सवा सौ साल पहले था, रत्ती भर भी बदलाव नहीं आया है। सिर्फ़ टिकिट देने वाली मशीन की जगह अब कम्पयूटर लग गया है। डीजल इंजन लगने के कारण पानी की टंकियाँ हटा दी गई हैं। पूर्व राष्ट्रपति अब्दूल कलाम जब डी आर डी ओ के हेड थे तब उन्होने अपनी एक गोपनीय यात्रा इस ट्रेन द्वारा रायपुर से धमतरी तक की थी। 
अब इस ट्रेन के दिन भी लदने वाले हैं। रायपुर से रेल्वे स्टेशन से हटा कर अब इसका परिचालन तेलीबांधा से किया जा रहा है। नई राजधानी से केन्द्री तक बड़ी रेल लाईन बिछाने का कार्य युद्ध गति से चल रहा है और समाचार मिला है कि केन्द्री से धमतरी तक भी इसका अमान परिवर्तन कर नेरोगेज को ब्राड गेज में तब्दील किया जाएगा। परन्तु छोटी गाड़ी के सफ़र का आनंद ही अलग है। इसे नए रायपुर में लोकल ट्रेन जैसे चलाना चाहिए। जिससे आने वाले पर्यटक सुबह शाम राजधानी भ्रमण का आनंद इस ट्रेन के माध्यम से कर सकें। वैसे इस ट्रेन के बंद होने में साल भर तो लग सकता है तब तक इसकी यात्रा का आनंद उठाया जा सकता है।
रानी माई की रहस्यमय दुनिया: बस्तर अंचलगोड़ मा पैरी, माथा म लाली वो SS, कान मा झुमका तिकोनी वाली होSS मोर गांवे म हाबे मड़ई, देखे ल आबे वोSS… वाहन में बज रहा छत्तीसगढ़ी गीत बसंत के इस मौसम में गाँव की मड़ई देखने का निमंत्रण दे रहा था। हम भी गांव की ओर जाने वाली सर्पीली सड़क पर गीत सुनते हुए बढ़े जा रहे थे, मड़ई वाला गाँव था रायपुर राजधानी से एक सौ चालिस किमी दूर कांकेर जिले की चारामा तहसील का हल्बा टिकरापारा। यह गाँव रानी डोंगरी ग्राम पंचायत का आश्रित ग्राम है, बस हमारी कहानी इस गाँव की ही कहानी है। हमारी गाड़ी जब गाँव में पहुंचती है तो बच्चे गाड़ी के पीछे दौड़ने लगते हैं, ऊंघती दोपहरिया में लोग चौकन्ने हो जाते हैं। एक घर के सामने कुछ आदमी औरतें बीड़ी बनाते दिखाई देते हैं और हमारी गाड़ी यही रुक जाती है।  | | हल्बा टिकरापारा की दुपहरिया |
सरपंच तिलक राम कुंजाम के आने के बाद चर्चा शुरु होती है। इस इस गाँव में लगभग 150 छानी (छतें) हैं, जिनमें बसने वाले सर्वाधिक गोंड़ जनजाति के लोग हैं, उसके बाद अधिक जनसंख्या कलार जाति के लोगों की है। धोबी, लोहार के साथ एक घर साहू जाति का भी है। गाँव में पेयजल का साधन नलकूप हैं और बाकी निस्तारी दो तालाबों से होती हैं। गांव में दो-तीन मंदिर भी हैं, जिसमें शीतला माता, शिव जी के साथ हनुमान जी भी विराजित हैं। प्रायमरी तक का स्कूल शिक्षा के लिए है, इसके बाद पास के ही हल्बा कस्बे में शिक्षा हेतू जाना पड़ता है। गैर अपासी गाँव होने के कारण सिंचाई के साधन उपलब्ध नहीं है, इसलिए बरसात पर आधारित धान की खेती करनी पड़ती है, वर्षा पर ही यहाँ का जीवन आधारित है, अन्य कोई रोजगार के साधन यहां उपलब्ध नहीं है।  | | रानी डोंगरी |
ग्राम पंचायत रानी डोंगरी नाम लोकदेवी देवी रानी माई के नाम से है, रानी माई आस पास के सात आठ गाँव की देवी हैं। जो टिकरापारा से लगभग 3 किमी की दूरी पर जंगल में डोंगरी की गुफ़ा में विराजती हैं, ग्राम परम्परा के अनुसार वहाँ पूजा करने के लिए बैगा किरपा राम सोरी नियुक्त है। जब भी देवी की पूजा करनी होती है या उन्हें ग्राम में आमंत्रित करना होता है तो बैगा के माध्यम से ही इस कार्य को सम्पन्न किया जाता है। मड़ई के दिन सारे गाँव वासी रानी माई होम धूप देकर गाँव आने का निमंत्रण देते हैं, तथा उसके आदेश के बाद मड़ई की डांग लेकर गाँव आया जाता है, देवी मड़ई के कार्य को सफ़ल बनाने के लिए गाँव में पधारती हैं, साथ ही अनुषांगी देवता भी ग्राम में पहुंचते हैं।  | | रानी माई के दरबार का रास्ता |
सरपंच, बैगा एवं ग्राम के पूर्व निवासी चंदूलाल जैन के साथ देवी स्थान पहुंचते हैं, यहाँ विशाल चट्टानों की छोटी सी डोंगरी है। डोंगरी के सामने ही सामुदायिक भवन बना दिया गया है, जिससे इसकी सुंदरता को ग्रहण लग गया है। देवी के स्थान तक पहुंचने के लिए पैड़ियों का निर्माण भी कर दिया गया है। नवरात्रि में यहाँ मेला लगता है और देवी का आशीर्वाद लेने के लिए वृहद संख्या में भक्त जन आते हैं तब यह वनांचल गुलजार हो जाता है माता के सेवा गीतों से। पैड़ियां जहाँ जाकर समाप्त होती हैं वहीं लगभग 50 फ़ुट ऊंची एकाश्म चट्टान है और इस चट्टान पर एक बड़ी चट्टान छत की तरह प्राकृतिक रुप से रखी हुई है। यहाँ खुले में रानी माई का स्थान है, इनकी कोई प्रतिमा नहीं है, यहाँ सिर्फ़ आभासी रुप में विराजमान होकर बैगा के माध्यम से अपना पर्चा देती हैं।  | | रानी माई के दरबार में बैगा किरपा राम सोरी |
बैगा किरपाराम बताते हैं कि देवी भीतर गुफ़ा में विराजित हैं, एकाश्म चट्टान के ऊंचाई में फ़ट जाने के कारण गुफ़ा तक पहुंचने का स्थान बंद हो गया, इसके पीछे के तरफ़ से गुफ़ा में जाने का स्थान है, परन्तु वहाँ भी बड़ी चट्टानों के गिरने के कारण रास्ता बंद हो गया है, सिर्फ़ भालू ही इस गुफ़ा में शरण लेते हैं। रानी माई के स्थान पर उनकी सेवा के लिए घोड़ा रखा गया है और पोला के दिन लोग यहाँ पर मिट्टी के बैल भी चढाने आते हैं। रानी माई आस-पास के रानी डोंगरी, टिकरापारा, कुरुभाट, कोटेला, टोंकोपाट आदि सात गांव की आराध्या हैं। इन गांव के लोग किसी दैवीय समस्या के निवारण के लिए रानी माई के स्थान पर आते हैं।  | | रानी माई के दरबार में चंदूलाल जैन, उनके भानजे, उनके मित्र, सरपंच तिलकराम कुंजाम एवं श्रीकांत दामले |
मान्यता है कि रानी माई का आगमन बस्तर से हुआ है, ये महानदी के साथ आई और इनके साथ बावन कोरी (52X20=1040) देवता भी आए। इन्होने ने इस डोंगरी को उपयुक्त जानकर अपना निवास बना लिया। इसके बाद इनका सारा परिवार पति देशमात्र,बेटा कुंवर पाट एवं बहु बिजली कैना, जोगड़ा बाबा, गढ़ हिंगलाज देवी, राजाराव देव भी आ गए हैं। इस तरह रानी माई का पूरा कुनबा ही इस स्थान पर जुट गया। बावन कोरी में बाकी देवता महानदी के पास ही रह गए, उनकी पूजा उनके ठहरने के स्थान पर जाकर ही की जाती है। यहां रानी माई के पति देशमात्र नहीं रहते, उन्हें अन्य स्थान पर रहना पड़ रहा है। बैगा बताते हैं कि इस स्थान पर एक बूढा सिंह भी रहता था जो देवी के स्थान के ईर्द गिर्द ही मंडराता रहता था। जब कोई पूजा करने आता था तब बह गुफ़ा में चला जाता था और पूजा करके लौटने पर फ़िर बाहर निकल आता था। लगभग बारह वर्षों से अब सिंह दिखाई नहीं देता। शायद गुफ़ा में बंद हो गया होगा।  | | रानी माई दरबार के पार्श्व की गुफ़ा से निकलते हुए लेखक |
रानी माई ने अपने पति देशमात्र को इस स्थान से भगा दिया, जिसके कारण उसे यहाँ से लगभग 12 किमी की दूरी पर भिरावर के पहाड़ पर बसना पड़ा। इसके पीछे कहानी है कि रानी देवी भक्त वत्सल हैं और वे प्रतिदिन सुबह उठकर भक्तों की फ़रियाद सुनती हैं। उनके पति देशमात्र ने खेत जोतने के लिए हल में भैंसा फ़ांद रखा था और खेत जोत रहे थे, उन्हें भूख लगने लगी, इधर रानी माई को भक्तों की फ़रियाद सुनते हुए विलंब हो गया और खाना पहुंचाने में देर हो गई। खाना न लाते देख देशमात्र नें भूख के कारण भैंसे का सींग तोड़ कर आग में भूंज लिया और उसे खाने लगे। रानी तभी खाना लेकर पहुंची तो उन्हें हड्डी जलने की बदबू आई, देखा कि उनका पति भैंसे का सींग तोड़ कर भूंज कर खा रहा है, उन्हें गुस्सा आ गया और उसे अपने स्थान पर कभी न आने चेतावनी दे दी। इससे देशमात्र भिरावर की पहाड़ी पर बस गए, उन्हें लगभग 12 गांव के लोग अपने अराध्य के रुप में मानते हैं।  | | रानी माई के दरबार का मनोरम दृश्य |
उपरोक्त कथा से पता चलता है कि ग्रामीण भक्तों का रानी माई से मानवीय संबंध है, वे अपने सुख दुख ही हर बात उनसे करते हैं और रानी माई उनका निदान भी करती है। पौराणिक देवताओं की तरह कोई बहुत बड़ा प्रभामंडल नहीं है, वे मानवीय गुणों से परिपूर्ण देवी हैं, उनका स्वभाव इससे ही पता चलता है कि पति द्वारा अनैतिक कार्य करने पर उसे भी उन्होने ने नहीं बख्शा तथा बेटे और बहू को अपने स्थान पर साथ ही रखा है। उनकी बहू बिजली कैना अर्थात बिजली की कन्या भी उनके साथ ही बेटी की तरह रहती है। सजा का भागी सिर्फ़ उनका पति ही बनता है। देवी के इस मनोरम स्थल पर पहुंच कर मन प्रसन्न हो जाता है। बस बिना किसी योजना के यहां शासकीय निर्माण कार्य इस स्थान की सुंदरता में धब्बा लगा रहे हैं। इस स्थान को प्राकृतिक रुप में रखने की आवश्यकता है तभी इसकी सुंदरता कायम रह सकती है। सांझ ढ़ल रही थी और हम भी विहंगों के साथ अपने नीड़ की ओर लौट रहे थे।
करिया धुरवाछत्तीसगढ़ अंचल में किसान धान की फ़सल कटाई, मिंजाई और कोठी में धरने के बाद एक सत्र की किसानी करके फ़ुरसत पा जाता है और दीवाली मनाकर देवउठनी एकादशी से अंचल में मड़ई मेलों का दौर शुरु हो जाता है। ये मड़ई मेले आस्था का प्रतीक हैं और सामाजिक संस्था को सुदृढ़ करने के साथ जनचेतना जागृति करने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। लगभग सभी छोटे बड़े गाँवों में इनका आयोजन होता है और यह उत्सव शिवरात्रि तक निर्बाध चलते रहता है। जनपदों में आज इस गांव में और कल उस गाँव में, मतलब पृथक पृथक दिन मड़ई का आयोजन होता है, जिसमें ग्राम देवताओं की पूजा पाठ के साथ मनोरंजन के नाच गाने का भी प्रबंध होता है। यह पर्व ग्राम समिति के माध्यम से संचालित होते हैं। 
वर्तमान में अंचल में मड़ई मेलों का दौर चल रहा है। बड़े मेले तो विशेष पर्व या माह की पूर्णिमा तिथि को नदी तट पर आयोजित होते हैं, पर मड़ई का आयोजन लगभग प्रत्येक ग्राम में हो जाता है। वर्तमान में मुझे महासमुंद जिले पिथौरा तहसील के करिया धुरवा में मड़ई उत्सव देखने का सुअवसर प्राप्त हुआ। इस स्थान पर कौड़िया राजा करिया धुरवा एंव धुरवीन का स्थान है और पूष माह की पूर्णिमा को यहां प्रतिवर्ष मड़ई का आयोजन होता है। यहाँ करिया धुरवा एवं धुरवीन का कांक्रीट का मंदिर बने हुए हैं और दोनो पृथक स्थानों पर विराजमान हैं।
करिया धुरवा के मंदिर प्रस्तर निर्मित बहुत सारी खंडित प्रतिमाएं सहेज कर रखी हुई हैं तथा इनमें घुड़सवार करिया धुरवा की प्रतिमा स्थापित है। वहीं सड़क के दूसरी तरफ़ धुरवीन भी घोड़े पर सवार होकर मंदिर में विराजमान है और यहां भी अनेक प्रस्तर निर्मित खंडित प्रतिमाएं रखी हुई हैं। ग्रामीण पुरुष एवं महिलाएं इन स्थानों पर नारियल पुष्प अर्पित कर धूप दीप प्रज्जवलित कर सकाम पूजा पाठ करते हैं तथा मनोकामना पूर्ण होने के लिए देवों से प्रार्थना करते हैं। इस दिन यहाँ भक्तों की काफ़ी संख्या देखी जा सकती है।
करिया धुरवा के विषय में जितने मुंह उतनी कहानियां एवं किंवदन्तियाँ सुनने मिलती हैं। मड़ई भ्रमण करते हुए हमारी भेंट मंदिर समिति के सचिव जी से होती है। उनका कहना है कि करिया धुरवा कौड़िया राजा थे, उनका विवाह सिंगा धुरवा की राजकुमारी से होना तय हुआ। विवाह से पूर्व उभय पक्षों में तय होता है कि विवाह के पश्चात दिन में विदाई हो जानी चाहिए और वर पक्ष दुल्हन लेकर सूर्यास्त के पूर्व अपने ग्राम पहुंच जाए।
करिया धुरवा बारात लेकर सिंगा धुरवा जाते हैं, परन्तु विवादि विदाई प्रक्रिया में विलंब हो जाता है। गाँव पहुंचने के पूर्व ही सूर्यास्त हो जाता है। बारातियों एवं दुल्हन के साथ गांव के बाहर ही रात बिताने के लिए डेरा डाल देते हैं। वर पक्ष एवं वधु पक्ष दोनों का डेरा अलग-अलग लगता है, परन्तु दैवीय आपदा के कारण दोनों पक्ष रात को पत्थर में बदल जाते हैं। यही पत्थर में बदले हुए धुरवा और धुरविन कालांतर में लोक देवता के रुप में पुजित होने लगे और लोक मान्य हो गए। छत्तीसगढ़ अंचल में मैने कचना धुरवा (गरियाबंद मार्ग पर) , सिंगा धुरवा (सिरपुर के 15 किमी दूरी पर पहाड़ी पर स्थित) और करिया धुरवा (अर्जुनी पिथौरा के समीप) तीनों को देखा है। किवदन्ति में तो इन्हें भाई बताया जाता है। परन्तु और भी कोई लोकगाथा प्रचलन में हो सकती है। करिया धुरवा में रखी हुई प्रस्तर प्रतिमाएं किसी मंदिर के भग्नावशेष भी हो सकते हैं, जो खेतों में यत्र-तत्र बिखरे पड़े थे और बाद में किसी ने एकत्रित कर दिए होगें। कुल मिलाकर बात यह है कि ये प्रस्तर प्रतिमाएं हमें इतिहास से जोड़ती हैं और गौरव प्रदान करती है। 
मड़ई मेलों में ग्रामीण उपयोग की वस्तुओं की दुकाने सजती हैं। सभी दुकानदार मड़ई के हाकां के अनुसार एक गांव से दूसरे गांव में भ्रमण करते रहते हैं। मिठाई की दुकाने, फ़ोटो स्टूडियों, टिकली फ़ुंदरी वाले, गोलगप्पे चाट वाले, गिलट के जेवर की दुकानें, गोदना वाले और भी तरह-तरह की सामग्रियों के विक्रेता अपनी दुकान सजाए रहते हैं। इसके साथ गांव के दुकानदार भी कुछ कमाई करने की दृष्टि से अपनी दुकाने लगाते हैं। सब्जियों इत्यादि की दुकाने भी सजती हैं। गोदना गोदवाने का प्रचलन आज भी आदिवासी समाज में बहुलता से दिखाई देता है। हम भी मड़ई भ्रमण कर ग्रामीण परिवेश का आनंद लेने के बाद लौट आए।
भाजी तेरे कितने रुप : छत्तीसगढ़छत्तीसगढ के भोजन में "भाजी" (पत्ते की सब्जी) का स्थान महत्वपूर्ण है। जितने प्रकार की भाजी का प्रयोग भोजन में छत्तीसगढ़वासी करते है, संभवत: भारत के अन्य किसी प्रदेश में नहीं होता होगा। घर के पीछे छोटी सी बखरी "बाड़ी" में मौसम के अनुसार भाजियों का उत्पादन हो जाता है। जब कोई साग न हो तो बाड़ी का एक चक्कर लगाने के बाद भोजन के लिए साग उपलब्ध हो जाता है। जिसने भाजी का स्वाद ले लिया हो, वह जीवन भर नहीं भूल सकता। कभी-कभी सोचता हूँ कि छत्तीसगढ की भाजियों का दस्तावेजीकरण होना चाहिए क्योंकि वर्षा ॠतु में स्वत: उगने वाली बहुत सारी भाजियाँ अब लुप्त होते जा रही हैं, जिन्हें बचपन में देखा और खाया था, वो अब दिखाई नहीं देती।  | | अमारी भाजी का फूल |
छत्तीसगढ़ में बोहार भाजी (लसोड़े के वृक्ष के पत्ते) मुनगा भाजी (सहजन के पत्ते) आदि वृक्ष के पत्तों की भाजी, पोई भाजी, कुम्हड़ा भाजी, कांदा भाजी आदि बेल (नार,लता) के पत्तों की भाजी, लाल भाजी, चौलाई, पालक, भथुआ, चेच भाजी,सरसों, पटवा भाजी, चना भाजी, मेथी भाजी, तिवरा भाजी, जड़ी (खेड़ा - इसमें पौधे का सर्वांग भाजी में उपयोग किया जाता है) भाजी, अमारी भाजी, कुसुम भाजी, मुरई (मूली) भाजी, चरोटा भाजी, प्याज भाजी इत्यादि पौधों के पत्तों की भाजी तथा तिनपनिया, चुनचुनिया, करमत्ता इत्यादि भाजी जल में उत्पन्न होती हैं। यहां पर कुछ ही भाजियों के नाम दिए गए हैं। इसके अतिरिक्त फ़ूलों से भी भाजी बनाई जाती है। ॠतु अनुसार भाजियों का सेवन किया जाता है, किसी-किसी भाजी को पकाने में मही (छाछ) या खट्टे की मुख्य भूमिका होती है। इसे दाल के साथ भी पकाया जाता है।  | | मूली भाजी |
मैदानी क्षेत्र के अलावा वन क्षेत्र की भाजियों के कई प्रकार पाए जाते हैं। गर्मी के दिनों में पत्तों को सुखाकर इनका प्रयोग बरसात के दिनों में भी किया जाता है।बस्तर से लेकर सरगुजा अंचल तक दैनिक जीवन में उपयोग में आने वाली भाजियों का दस्तावेजीकरण किया जाए तो इनकी संख्या हजार तक तो पहुंच सकती है। इनमें औषधीय तत्वों की प्रचुरता रहती है। इनका औषधिय महत्व भी बहुत अधिक है, ॠतुओं के अनुसार भाजियों का सेवन स्वास्थवर्धक होता है तथा मानव शरीर के स्वस्थ रहने योग्य आवश्यक, प्रोटीन, विटामिन, खनिज, लवण की पूर्ती इनके द्वारा सहज ही हो जाती है। इसके अतिरिक्त वृक्ष या पौधे से प्राप्त होने वाले फ़ल-फ़ूल-कंद से बनने वाले साग भी है।  | | केऊ कन्द |
मूली का मौसम होने के कारण वर्तमान में घर-घर में मूली भाजी पकती है। गांव या मोहल्ले में किसी के घर मूली की भाजी पक रही होती है दूर से ही पता चल जाता है। गांव-गांव परिव्राजक की तरह घूम कर बुजूर्गों से भाजियों के विषय में चर्चा करते हुए, स्वाद लेकर, रेसिपी जमा करते हुए इनका दस्तावेजीकरण हो सकता है, जो बड़ा ही श्रम साध्य कार्य है। कोई शोधार्थी इस विषय पर शोध भी कर सकता है जिससे विलुप्त हो रही भाजियां भी सूचिबद्ध हो सकती हैं। भाजियों का राजा बोहार भाजी को माना जा सकता है। क्योंकि जब गर्मी के दिनों में इसका सीजन होता है तो यह सबसे मंहगी (डेढ़ सौ से लेकर दो सौ रुपए किलो तक बिकती है) बिकती है। छत्तीसगढ़ की भाजियों की कथा अनंत है, जिसने इनका स्वाद ले लिया वह जीवन भर नहीं भूल सकता। यही विशेषता है, छत्तीसगढ़ की भाजियों की। बचपन में कहते-सुनते थे, आलू, भांटा, मुरई, बिन पूंछी के चिरई… छत्तीसगढ़ का शाही साग : जिमीकंददीपावली का त्यौहार समीप आते ही छत्तीसगढ़ में लोग बाड़ी-बखरी की भूमि में दबे जिमीकंद की खुदाई शुरु कर देते हैं। किलो दो किलो जिमीकंद तो मिल ही जाता है। वैसे भी वनांचल होने के कारण छत्तीसगढ़ में बहुतायत में पाया जाता है। इसका प्रयोग भोजन में मुख्यत: सब्जी के रुप में तो किया ही जाता है इसके साथ गोवर्धन पूजा के दिन पशुओं को भी खिचड़ी में कोचई के साथ मिलाकर खिलाया जाता है। अन्य कई प्रदेशों में दीवाली के दिन इसकी सब्जी बनाने की परम्परा है, जिसके पीछे मान्यता है कि दीपावली के दिन जिमीकंद की सब्जी खाने से आदमी अगले जन्म में छछुंदर नहीं बनता। इसके औषधीय गुणों के कारण धार्मिक त्यौहार से जोड़ दिया गया है, जिससे व्यक्ति कम से कम वर्ष में एक दो बार इसका सेवन कर ले।  भारत के अन्य प्रदेशों में इसे सूरन, ओल, जिमीकंद इत्यादि नामों से जाना जाता है। गुजरात में तो मुझे सूरनवाला सरनेम भी देखने मिला। देशी जिमीकंद को खाने के बाद खुजली होने के कारण सब्जी बनाने के लिए लम्बी प्रक्रिया से गुजरना पड़ता है। परन्तु अब हाईब्रीड जिमीकंद आ गए हैं जिनके खाने या काटने से खुजली नहीं होती। दीवाली के समय यह बाजार में बड़ी मात्रा में दिखाई देता है। यह खोदकर बाहर निकालने के बाद भी साल भर तक खराब नहीं होता। इसे एकमुश्त खरीद कर घर में रखा जा सकता है और बरसात में भूमि में गाड़ने के बाद दीवाली तक यह बड़ा हो जाता है।
आयुर्वेद में इसे स्वास्थ्यकारक बताया है, एक तरह से यह औषधि का ही काम करती है। कहा जाता है कि ठंड के दिनों में प्रत्येक व्यक्ति को कम से कम इसका दो बार सेवन करना ही चाहिए, जिससे कफ़ जनित रोगों का शमन होता है और ठंड से होने वाली बीमारियों से बचा जा सकता है। यह कफ़ एवं सांस की समस्या में भी कारगर औषधि के रुप में कार्य करता है। इसमें फाइबर, विटामिन सी, विटामिन बी 6, विटामिन बी1, फोलिक एसिड और नियासिन होता है। साथ ही मिनरल जैसे, पोटैशियम, आयरन, मैगनीशियम, कैल्शियम और फॉसफोरस पाया जाता है। इसमें पाए जाने वाले विटामिन, खनिज आदि औषधि तत्वों के कारण ग्रामीण अंचल में प्रचलन है। इसकी सब्जी दही, टमाटर, ईमली आदि की खटाई के साथ बनाई जाती है, जो इसके खुजलीकारक तत्वों को खत्म कर देती है। विशेषकर दही के साथ बनाई गई सब्जी का आनंद ही कुछ और है। मुझे इसकी सब्जी बहुत ही पसंद है, वैसे भी इसकी सब्जी को शाहीसाग की पदवी मिली हुई है। इसकि सब्जी बनाने के लिए सुबह प्रक्रिया प्रारंभ की जाती है, तब जाकर रात को सब्जी मिल पाती है। चलिए जिमीकंद की सब्जी बनाकर खाईए और स्वस्थ रहने का आनंद लीजिए…।
प्राचीन मंदिरों के वास्तु शिल्प में नागांकनसर्प एवं मनुष्य का संबंध सृष्टि के प्रारंभ से ही रहा है। यह संबंध इतना प्रगाढ एवं प्राचीन है कि धरती को शेषनाग के फ़न पर टिका हुआ बताया गया है। इससे जाहिर होता है कि धरती पर मनुष्य से पहले नागों का उद्भव हुआ। वैसे भी नाग को काल का प्रतीक माना जाता है। जो शिव के गले में हमेशा विराजमान रहता है। कहा गया है - काल गहे कर केश। इसके पीछे मान्यता है कि काल धरती के जीवों का कभी पीछा नहीं छोड़ता और हमेशा उसके गले में बंधा रहता है। इस मृत्यू के प्रतीक को मनुष्य ने हमेशा अपने समक्ष ही रखा और मानव जीवन में भी महत्वपूर्ण स्थान दिया।  | | राजा रानी मंदिर के द्वार पर स्थापित नागप्रहरी - भुवनेश्वर उड़ीसा |
शासकों के कुल भी नागों से चले, नागवंशी, छिंदक नागवंशी, फ़णीनागवंशी इत्यादि राजकुलों की जानकारी हमें मिलती है। इसके साथ ही हमें मंदिरों के द्वार शाखा एवं भित्तियों पर अधिकतर नाग-नागिन का अंकन मिलता है। वासुकि नाग एवं पद्मा नागिन का पाताल लोक के राजा-रानी के रुप में वर्णन मिलता है। नागों को एक दूसरे से गुंथित या नाग-वल्लरी के रुप में दिखाया जाता जाता है भारतीय शिल्पकला में इन्हें देवों के रुप में प्रधानता से स्थान दिया जाता है। इसके पीछे मान्यता है कि मंदिर के प्रवेश के समय इनके दर्शन करना शुभ एवं सौभाग्य का प्रतीक माना जाता है।  | | राजीवलोचन मंदिर राजिम छत्तीसगढ़ के मंडप स्तंभ पर अंकित नागपाश |
प्रागैतिहासिक शैलचित्र कला में नाग का चित्रण, मोहनजोदड़ो, हड़प्पा से प्राप्त मुद्राओं पर नागों का अंकन हुआ है, जो नागपूजा का प्राचीनतम प्रमाण माना जाता है। इससे स्पष्ट होता है कि मानव प्राचीन काल से नागपूजा कर रहा है। नाग का भारतीय धर्म एवं कला से घनिष्ठ संबंध रहा है। कहा जाए तो नागपूजा हड़प्पा काल से लेकर वर्तमान काल तक चली आ रही है। इसके पुरातात्विक एवं साहित्य प्रमाण प्रचुरता में मिलते हैं। मंदिरों की द्वार शाखाओं पर नागाकृतियों का उत्कीर्ण किया जाना, विष्णु की शैय्या के रुप में, शिव के गले में, बलराम एवं लक्ष्मण को शेषावतार के रुप में प्रदर्शित किया जाना।  | | राजीवलोचन मंदिर राजिम छत्तीसगढ़ के मंडप के द्वार शीर्ष पर शेष शैया | वासुकिनाग का समुद्र मंथन के साथ उल्लेख, वराहावतार का प्रतिमा के साथ नाग का आबद्ध होना, भारतीय संस्कृति में नागपूजा एवं उसके महत्व को प्रदर्शित करता है। जैन परम्परा में भी तीर्थंकर पार्श्वनाथ एवं सुपार्श्वनाथ के साथ पांच फ़न एवं सप्तफ़न के नाग लांछन का प्रयोग किया जाता है, जो जैन संस्कृति में नाग के महत्व को उजागर करते हैं। | | छत्तीसगढ़ के प्राचीन नगर सिरपुर से उत्खनन में प्राप्त जैन तीर्थांकर पार्श्वनाथ की प्रतिमा |
पूर्व मध्यकाल एवं उत्तरमध्यकाल से लेकर आज तक लगभग प्रत्येक ग्राम में नागदेवताओं की किसी न किसी रुप में पूजा की जाती है। इसकी प्रतिमाएं आज भी गांवों में मिलती है तथा नागपंचमी का त्यौहार तो वर्ष में एक बार मनाया ही जाता है। इस विषधर जीव की जितने मुंह उतनी कहानियां मिलती हैं। शायद मनुष्य ने भयभीत होकर इस काल के प्रतीक की पूजा प्रारंभ की होगी और कई परिवारों में इसे कुलदेवता के रुप में मान्यता मिली हुई है, मनुष्य आज तक इसके महत्व एवं उपस्थिति के साथ बल को नकार नहीं सका है।
पुरातत्व शास्त्र की वर्णमाला :मृदा भाण्डसभ्यता के विकास के साथ मानव चरणबद्ध रुप से दैनिक कार्य में उपयोग में आनी वाली वस्तुओं का निर्माण करता रहा है। इनमें भाण्ड प्रमुख स्थान रखते हैं। जिन्हें वर्तमान में बरतन कहा जाने लगा है। प्राचीन काल में मानव मिट्टी के बरतनों का उपयोग करता था। किसी भी प्राचीन स्थल से उत्खनन के दौरान लगभग सभी चरणों से मिट्टी के बर्तन प्राप्त होते हैं तथा उत्खनन स्थल पर एक बहुत बड़ा यार्ड इनसे बन जाता है। इस यार्ड में इन्हें वैज्ञानिक अन्वेषण के लिए क्रमानुसार रखा जाता है। छत्तीसगढ़ के डमरु में उत्खनन में अन्य पॉटरी के साथ कृष्ण लोहित मृदा भांड भी प्राप्त हुए। इन्हें देखकर मुझे ताज्जुब हुआ कि एक ही बरतन एक तरफ़ काला और एक तरफ़ लाल दिखाई दे रहा है। वैसे तो इन बरतन को रंग कर यह रुप दिया जा सकता था, परन्तु इन बरतनों को लाल और काला रंग पकाने के दौरान ही दिया गया था।  | | मृदाभाण्ड बनाने की तकनीक का निरीक्षण करते हुए लेखक |
कुम्हारों के द्वारा वर्तमान में किस तरह के बरतन बनाए एवं पकाए जा रहे हैं यह देखने के लिए हम समीप के गाँव में कुम्हार के भट्टे पर निरीक्षण करने के लिए गए। वहाँ कुम्हार से चर्चा की और उसके भाण्डों को भी देखा। इन भाण्डों में उत्खनन में प्राप्त भाण्डों जैसी स्निग्धता, चमक एवं मजबूती नहीं थी इससे साबित हुआ कि प्राचीन काल में भाण्ड निर्माण की प्रक्रिया वर्तमान से उन्नत थी और निर्माता भी समाज में उच्च स्थान रखता था। तभी तो सिरपुर स्थित तीवरदेव विहार के मुख्यद्वार की शाखा में शिल्पकार ने चाक सहित कुम्हार को स्थान दिया है। यह उनके सामाजिक मह्त्व को बताता है।  | | मृदा भाण्ड पकाने की वर्तमान तकनीकि |
पिछली शताब्दी में प्राचीन स्थलों का अन्वेषण एवं उत्खनन का लक्ष्य मात्र मुल्यवान एवं कलात्मक सामग्री की खोज करना था। मृदा भांडों एवं उनके टुकड़ों की गणना व्यर्थ समझी जाती थी। प्राय: उत्खननकर्ता इन्हें फ़ेंक देते थे अथवा इतना अनुमान लगाते थे कि उस समय की सभ्यता में लोग किन-किन बर्तनों का उपयोग करते थे, इनसे उस युग का आर्थिक जीवन जोड़ते थे, परन्तु उत्खनन की दृष्टि से इनका कोई महत्व नहीं माना जाता था।  | | उत्खनन में पाप्त मृदाभाण्ड के टुकड़े - डमरु जिला बलौदाबाजार छत्तीसगढ़ |
सर्वप्रथम फ़्लिंडर्स पेट्री ने मिश्र में उत्खनन कार्य करते हुए अनुभव किया कि प्रत्येक काल में विभिन्न प्रकार के कौशल से निर्मित मृदाभांडों का प्रचलन रहता है और परम्परानुराग के कारण शीघ्र ही आमूल परिवर्तन नहीं होता। चर्म एवं काष्ठ की सामग्रियाँ जहां मिट्टी में दबे होने के कारण नष्ट हो जाती हैं, वहीं भांड हजारों वर्षों तक मिट्टी में दबे होने के बाद भी नष्ट नहीं होते। अत: पुरातत्व के अध्ययन में इनका महत्वपूर्ण उपयोग हो सकता है। पेट्री की इस दृष्टि ने पुरातन सभ्यताओं के अध्ययन में क्रांति ला दी। तब से मृदा पात्रों एवं भाण्डों का अध्ययन पुरातत्व शास्त्र का एक आवश्यक अंग माना जाने लगा।  | | कुम्हार के आवे पर- डॉ शिवाकांत बाजपेयी, डॉ जितेन्द्र साहू एवं करुणा शंकर शुक्ला |
आज मृदाभाण्डों को पुरातत्व शास्त्र की वर्णमाला कहा जाता है। जिस प्रकार किसी वर्णमाला के आधार पर ही उसका साहित्य पढा जाता है, उसी प्रकार मृदा भाण्ड अपने काल की सभ्यता सामने लाते हैं। इनके निर्माण की एक विशिष्ट शैली का प्रचलन एक काल का द्योतक होता है। उनको एक विशिष्ट शैली में निर्मित एवं रंगों में वेष्टित करते हैं। जैसे कभी अंगुठे के प्रयोग से बर्तन बने तो कभी मिट्टी की बत्तियों से बनाए गए तो कभी चाक से बनाए गए। यह विकास अलग-अलग काल को दर्शाता है तथा बरतनों के आवश्यकतानुसार नवीन प्रकार भी दिखाई देते हैं।  | | पॉटरी यार्ड - तरीघाट उत्खनन जिला दुर्ग छत्तीसगढ़ |
रंगों के संबंध में हम देखते हैं कि भारत में कभी कृष्ण लोहित मृदा भांड बने तो कभी चित्रित धूसर बने, तो कभी कृष्णमार्जित एवं कृष्णरंजित लोहित मृदाभांड बने। ये सारे न तो एक समय में बने है और न एक ही लोगों द्वारा बनाए गए हैं। अलग-अलग कालों में, भिन्न-भिन्न लोगों द्वारा पृथक रंगों के मृदा भाण्डों का विकास हुआ। इससे स्तरीकरण एवं इन मृदा भाण्डों के साथ प्राप्त सामग्रियों से कालनिर्धारण में सहायता मिलती है। अन्य सामग्रियों एवं अभिलेखों की अनुपलब्धता में उत्खननकर्ता मृदाभाण्डों का अध्ययन कर काल का निर्धारण कर सकता है। इसलिए मृदाभाण्ड काल निर्धारण के लिए मह्त्वपूर्ण रुप से सहायक होते हैं। मृदा भाण्डों का महत्व मानव सभ्यता के साथ सतत बना हुआ है और बना भी रहेगा।
इतिहास की खोई हुई कुंजी है शंख लिपिविचारों को व्यक्त करने का माध्यम वाणी है, यह वाणी विभिन्न भाषाओं के माध्यम से संसार में प्रकट होती है। इन भाषाओं को दीर्घावधि तक स्थाई रुप से सुरक्षित रखने एवं एक स्थान से दूसरे स्थान तक ले जाने का कार्य लिपि करती है। कहा जाए तो भाषा को जीवंत रखने के लिए हम जिन प्रतीक चिन्हों का प्रयोग करते हैं, उन्हे लिपि कहते हैं। हम गुहा चित्रों, भग्नावशेषों, समाधियो, मंदिरो, मृदाभांडों, मुद्राओं के साथ शिलालेखो, चट्टान लेखों, ताम्रलेखों, भित्ति चित्रों, ताड़पत्रों, भोजपत्रों, कागजो एवं कपड़ों पर अंकित मनुष्य की सतत भाषाई एवं लिपिय प्रगति देख सकते हैं। इन सबको तत्कालीन मानव जीवन का साक्षात इतिहास कहा जा सकता है।  | | उदयगिरि मध्यप्रदेश |
सभ्यता और संस्कृति के विकास के साथ साथ भाषा एवं लेखनकला का विकास भी होता रहा। प्रारंभ में लिखने के साधन गुफाओं की दीवारें, र्इंट, पत्थर, मृद्पात्र एवं शिलापट्ट आदि थे। देश, काल एवं परिस्थिति अनुसार ये साधन बदलते गये और लिपि एवं भाषा परिस्कृत होती गई।विचारों की अभिव्यक्ति के लिए भाषा एवं लिपि प्रथम साधन है। लिपि के अभाव में अनेक भाषाएँ उत्पन्न होकर नष्ट हो गई । आज उनका नामो निशान तक नहीं रहा। लिपियाँ भी समाप्त हो गई, वे भी इससे अछूती नहीं रही। ललितविस्तर आदि प्राचीन ग्रंथों में तत्कालीन प्रचलित लगभग चौंसठ लिपियों का नामोल्लेख मिलता है, लेकिन आज उसमें में अधिकांश लिपियाँ अथवा उनमें लिखित साहित्य उपलब्ध नहीं है।  | | शंख लिपि उदयगिरि |
कुछ प्राचीन लिपियाँ आज भी एक अनसुलझी पहेली बनी हुई हैं। उनमें लिखित अभिलेख आज तक नहीं पढ़े जा सके हैं। आज हम देखते हैं कि भारत में बहुधा प्राचीन स्थालों, पर्वतों एवं गुफाओं में टंकित ‘शंख लिपि’ के सुन्दर अभिलेख प्राप्त होते हैं इनको भी आज तक नहीं पढ़ा जा सका है। इस लिपि के अक्षरों की आकृति शंख के आकार की है। प्रत्येक अक्षर इस प्रकार लिखा गया है कि उससे शंखाकृति उभरकर सामने दिखाई पड़ती है। इसलिए इसे शंखलिपि कहा जाने लगा।  | | शंखलिपि सरगुजा सीता लेखनी पहाड़ |
जब भी मैं प्राचीन स्थलों पर शंख लिपि को देखता हूं तो मन जिज्ञासा से भर उठता है, कि प्राचीन काल का मनुष्य इस लेख के माध्यम से आने वाले पीढी को क्या सूचना एवं संदेश देना चाहता था। परन्तु लिपि की जानकारी की अभाव में यह रहस्य स्थाई हो गया है। विद्वान गवेषक इन लेखों को पढने का प्रयास कर रहे हैं लेकिन अभी तक योग्य सफलता नहीं मिल सकी है। आज भी विविध सिक्कों, मृद्पात्रों एवं मुहरों पर लिखित ऐसी कई लिपियाँ और भाषाएँ हमारे संग्रहालयों में विद्यमान हैं जो एक अनसुलझी पहेली बनी हुई है। समय को प्रतीक्षा है इन पहेलियों के सुलझने की। जब इनमें कैद इतिहास बाहर निकल कर सामने आएगा और नई जानकारियाँ मिलेगी।
कुंआ: मानव सभ्यता की पहचानजल ही जीवन है, क्षितिज, जल, अग्नि, गगन एवं हवा आदि पंच तत्वों में अनिवार्य तत्व जल भी है। बिना जल के जीवन की कल्पना भी नहीं की जा सकती। मानव ने सभ्यता के विकास के क्रम में जल की अनिवार्य आवश्यकता की पूर्ति हेतु नदियों एवं प्राकृतिक झीलों के किनारे अपना बसेरा किया। वह नदियों एवं झीलों के जल से निस्तारी करता था। जब मानव समूह विशाल रुप लेने लगे तो गाँव एवं नगर बसने लगे। निवासियों के लिए जल उपलब्ध कराने की दृष्टि से कुंए, तालाब इत्यादि निर्मित किए जाने लगे। आवागमन के मार्गों पर जल की व्यवस्था कुंए एवं प्याऊ के रुप में की जाने लगी। इस तरह भू-गर्भ जल की उपस्थिति को मनुष्य ने जान लिया और मानवकृत जल के संसाधन विकसित होने लगे।  | | हड़प्पाकालीन नगर लोथल (गुजरात) के कुंए का निरीक्षण करते हुए विनोद गुप्ता जी के साथ |
पेयजल की उपलब्धता के लिए प्राचीन काल से मानव ने कुंए, बावड़ियों एवं तालाबों का निर्माण किया। पुरातात्विक स्थलों के उत्खनन के दौरान प्राचीन नगर बसाहटों में कुंए मिलते हैं। हड़प्पा काल में नगर के मध्य एवं व्यापारिक केन्द्रों में पक्के कुंए होते थे। मोहन जोदड़ो, हड़प्पा, लोथल इत्यादि स्थानों पर उत्खनन के दौरान पक्के कुंए प्राप्त हुए हैं। इसी तरह छत्तीसगढ़ अंचल के सिरपुर में पक्के प्राचीन कुंए उत्खनन में प्राप्त हुए हैं, जिनमें अभी भी मीठा जल उपलब्ध है। इसके साथ ही प्राचीन व्यापार मार्गों पर भी कुंओं के अवशेष मिलते हैं।
तुलसीदास जी ने रामचरित मानस में रावण की वाटिका वर्णन करते हुए लिखा है - बन बाग उपवन वाटिका, सर कूप वापी सोहाई। जल के बिना जीवन नहीं है, अत: रावण की लंका में भी कूप, वापी सरोवरों की बहुतायता पाई गई। स्नान के लिए सरोवर, पेयजल की प्राप्ति के लिए कूप एवं सिंचाई तथा पशुओं की निस्तारी के लिए बावड़ियों का निर्माण कराया गया था। राज्य द्वारा प्रजा की सुविधाओं को ध्यान में रखते हुए जल की उत्तम व्यवस्था की जाती थी।
संस्कृत साहित्य के प्रसिद्ध कवि बाण अपनी कृति कादंबरी (सातवीं शताब्दी) में पोखर-सरोवर खुदवाने को सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानते थे. लोक-कल्याण हेतु इस प्रकार के खुदवाए गए जलकोष को चार वर्गों में विभाजित किया गया है- 1.कूप जिसका व्यास 7 फीट से 75 फीट हो सकता है और जिससे पानी डोल-डोरी से निकाला जाए, 2. वापी, छोटा चौकोर पोखर, लंबाई 75 से 150 फीट हो और जिसमें जलस्तर तक पाँव के सहारे पहुँचा जा सके, 3.पुष्करणी, छोटा पोखर, गोलाकार, जिसका व्यास 150 से 300 फीट तक हो, 4.तड़ाग पोखर, चौकोर, जिसकी लंबाई 300 से 450 फीट तक हो.।
जल की व्यवस्था हमारे समाज के लिए कभी मजबूरी रही होगी परन्तु कालांतर में इसने परम्परा का रुप ले लिया। पोखर की चर्चा ऋग्वेद में भी है. गृह्मसूत्र के अनुसार, किसी भी वर्ग या जाति का कोई भी व्यक्ति, पुरूष या स्त्री पोखर खुदवा सकता है और यज्ञ करवाकर समाज के सभी प्राणियों के कल्याण-हेतु उसका उत्सर्ग कर सकता है. आज भी यह काम पुण्य कमाने का समझा जाता है। कुंआ पोखर आदि निर्माण करने को प्रोत्साहित करने के लिए शास्त्रों द्वारा महिमा मंडन किया गया, कहते है - जो धनी पुरुष उत्तम फल के साधन भूत ‘तडाग’ का निर्माण करता है और दरिद्र एक कुआँ बनवाता है, उन दोनों का पुण्य समान होता है। जो पोखरा खुदवाते हैं, वे भगवान् विष्णु के साथ पूजित होते हैं।
महाभारत में भीष्म पर्व के माध्यम से वेदव्यास ने कोई तालाब कितने समय के लिए पानी संचित रख सकता है उसके अनुरूप उनका विभाजन किया है। उन्होंने इस तरह के तालाबों के निर्माण से मिलने वाले पुण्य की भी व्याख्या की है। हिन्दू संस्कृति में इस तरह के जल-स्रोतों का निर्माण एक धार्मिक कृत्य माना जाता रहा है और इसे अपनी कीर्ति रक्षा का सबसे सहज उपाय भी बताया गया है। कूप या कुएं इस श्रृंखला की सब से छोटी इकाई हुआ करते थे जो कि न केवल पेय जल के स्रोत थे वरन उनके आकार के अनुसार उनसे सिंचाई की भी संभावनाएं बनती थीं।  | | सिरपुर के बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
कवि केशवदास ने कविप्रिया में नगर वर्णन करते हुए लिखा है - खाई कोट अट ध्वजा, वापी कूप तड़ाग, वार नारी असती सती, वरनहु नगर सभाग। पदमावत में जिक्र है कि वारी सुफ़ल आहि, तुम बालापन में ही फ़ल गई, मध्यकाल में वाटिका लगाने के बाद उसका विवाह किया जाता था। तब तक लगाने वाला उसका फ़ल न खाता था। वाटिका लगाने एवं फ़लने के बाद वापी कूप तड़ाग का विवाह करने के बाद ही स्वामी उनका उपभोग करता था। व्यंग्य करते हुए कहा है कि - तुम्हारी वाटिका तो कुंवारी ही फ़ल गई।
कुंओं का निर्माण करना साधारण कार्य नहीं था। भू-गर्भ से जल निकालने के लिए भू-तल तक उत्खनन करना पड़ता था। कुंओं का निर्माण करने के लिए शिल्पशास्त्रों ने विधान बताया है। शिल्पशास्त्र मयमतम के रचयिता कहते हैं - ग्राम आदि में यदि कूप नैऋत्य कोण में हो तो व्याधि एवं पीड़ा, वरुण दिधा में पशु की वृद्धि, वायव्य कोण में शत्रु-नाश, उत्तर दिशा में सभी सुखों को प्रदान करने वाला तथा ईशान कोण में शत्रु का नाश करने वाला होता है । ऐसा कहा गया है ॥१-२॥ वराह मिहिर ने कहा है - यदि ग्राम के या पुर के आग्नेय कोण में कूप हो तो वह सदा भय प्रदान करता है तथा मनुष्य का नाश करता है । नैऋत्य कोण में कूप होने पर धन की हानि तथा वायव्य कोण में होने पर स्त्री की हाने होती है । इन तीनों दिशाओं को छोड़कर शेष दिशाओं में कूप शुभ होता है ॥४-५॥
स्थान चयन के लिए परम्परागत साधनों से भू जल की उपस्थिति जांचने के बाद समस्त देवताओं का आहवान एवं पूजन करके कूप का निर्माण निश्चित किया जाता था। सही मुहूर्त में कूप का निर्माण प्रारंभ किया जाता था। भूमि के आधार पर कुंओं को खोदने के पृथक पृथक निर्माण विधि प्रयोग में लाई जाती थी। जहाँ मिट्टी मजबूत होती थी वहाँ वांछित गहराई तक कुंआ खोदने के पश्चात उसे ईंटों या पत्थरों से पक्का बांधा जाता था। जहाँ रेत पाई जाती है वहाँ जमीन पर ही कुंओं की चिनाई करके बाद उसके नीचे की रेत धीरे-धीरे सावधानीपूर्वक निकाली जाती है। इसे स्थानीय भाषा में "कोठी गलाना" कहते हैं। यह विधि खतरनाक भी है क्योंकि यहाँ कुंओं में जल सामान्य से अधिक उत्खनन के पश्चात निकलता है। कभी कभी ईटों के भसकने के कारण मजदूरो के दब जाने से जान लेवा दुर्घटनाएँ हो जाती हैं।
शास्त्रकार कूप निर्माणकार के प्रोत्साहन की दृष्टि से नारद पुराण कहता है- एकाहं तु स्थितं पृथिव्यां राजसन्तम। कुलानि तारयेत् तस्य सप्त-सप्त पराण्यपि।।65।। अर्थात्-जिसकी खुदवाई हुई पृथ्वी में केवल एक दिन भी जल स्थित रहता है, वह जल उसके सात कुलों को तार देता है। दीपालोक प्रदानेन वपुष्मान् स भवेन्नरः। प्रेक्षणीय प्रदानेन स्मृतिं मेधां च विंदति।।66।। अर्थात्- ‘दीप दान’ करने से मनुष्य का शरीर उत्तम हो जाता है और जल के दान के कारण उसकी स्मृति और मेधा बढ़ जाती है। -बृहस्पति स्मृति।
शास्त्रों में नृपों के लिए स्पष्ट निर्देश देकर जल प्रदुषित एवं जल साधन नष्ट करने वाले के लिए दंड का विधान किया गया है। लिखित स्मृति कहती है- पूर्णे कूप वापीनां वृक्षच्छेदन पातने। विक्रीणीत गजं चाश्वं गोवधं तस्य निर्द्दिशेत्।। अर्थात्- जो मनुष्य कुआँ या बावड़ी को पाट देता है, वृक्षों को काट कर गिरा देता है तथा हाथी या घोड़े को बेचता है, उसे ‘गौ के हत्यारे’ के समान मानकर दण्डित करना चाहिए। ‘तडाग देवतागार भेदकान् घातयेन्नृपः।।‘ ‘अग्नि पुराण’ में राजाओं के लिए स्पष्ट निर्देश है कि यदि कोई व्यक्ति जलाशय या देवमंदिर को नष्ट करता है तो राजा उसे ‘मृत्युदण्ड’ से दण्डित करे। स्कंद पुराण के माहेश्वर खण्ड में कहा गया है कि जो व्यक्ति पोखरा को बेच देते हैं, जो जल में मैथुन करते हैं तथा जो तालाब और कुओं को नष्ट करते हैं, वे ‘उपपातकी’ हैं। ऐसे व्यक्ति जब दुबारा जन्म लेते हैं तो वे अपने ‘हाथों’ से वंचित होते हैं।  | | सिरपुर के प्राचीन बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
जल सर्वकाल में मानव एवं चराचर जगत के लिए जीवन का स्रोत है, इसके महत्व को प्राचीन काल के मानवों ने समझा तथा जल की समुचित व्यवस्था की ओर ध्यान देते हुए जल के संसाधनों के रुप में कूप, तालाबों का निर्माण करवाया। हरियाणा, राजस्थान एवं उत्तर प्रदेश के हरितक्षेत्र में कुंआ पूजन का विधान है। पुत्र जन्म होने पर स्त्रियाँ सद्य: प्रसुता से कुंए की समारोह पूर्वक पूजा करवाती हैं। यह जल संसाधन के प्रति सम्मान एवं कृतज्ञता प्रकट करने का सामाजिक नियम निर्मित किया गया है। इस तरह कुंए प्राचीन काल से मानव सभ्यता एवं प्राणी जगत की जलापूर्ति का साधन बने हुए हैं। बढती हुई जनसंख्या के समक्ष जलापूर्ति एक विकराल समस्या के रुप में सामने आ रही है। भू-जल का स्तर निरंतर गिरता जा रहा है। पर्जन्य से जितना जल पृथ्वी पर आता है उसे बचाकर भू-गर्भ के जल की वृद्धि करने का प्रयत्न करना चाहिए।
रात होटल में सतीश जायसवाल जी से भेंट हुई थी, जब उन्हें हमारी मल्हार यात्रा का पता चला तो उन्होंने सहयोग की दृष्टि से मल्हार निवासी गुलाब सिंह को फ़ोन लगाया, वे घर पर नहीं मिले। फ़िर उन्होने उनका नम्बर द्वारिका प्रसाद जी को दे दिया। जिससे हम मल्हार पहुंचने के बाद उनसे सम्पर्क कर सकें। मल्हार पहुंचने पर उनका नम्बर "नाट रिचेबल" कहने लगा। मल्हार भ्रमण कराने के लिए अन्य सुत्र नहीं मिला तो हम खुदमुख्त्यार हो गए। डिड़नेश्वरी देवी दर्शन के पश्चात हमें पता चला कि बस्ती के भीतर कोई नंद महल नामक मंदिर है। हमने कार बाजार में ही वृक्ष के नीचे खड़ी कर दी और रास्ता पूछते हुए चल पड़े।  | | प्राचीन भवनों के पत्थरों का उपयोग |
कदमों से चल कर किसी बस्ती को नापना मुझे अच्छा लगता है। मल्हार का बाजार छोटा सा है, पर आवश्यकता सभी वस्तुएँ यहाँ उपलब्ध है। बड़ी खरीददारी के लिए इन्हें बिलासपुर जाना पड़ता है। नंद महल के रुप में मैने सोचा था कि कोई बड़ा भवन होगा। जिसमें कोई मंदिर होगा। पैदल चलते हुए बस्ती का निरीक्षण भी हो रहा था। प्राचीन नगरी के भग्नावशेषों पर गांव बसने के कारण पुराने घरों की नींव और दीवालों में पुरा सामग्री प्रयोग की हुई मिल जाती है। जैसे सिरपुर में मकान बनाने के लिए कहीं बाहर से पत्थर लाने की जरुरत नहीं होती थी। किसी भी स्थान को खोदने से प्राचीन दीवाल आदि मिल जाती थी उसके पत्थर ही भवन निर्माण के लिए पर्याप्त होते थे।  | | वैवाहिक जानकारी |
गाँव में घरों की दीवाले होली-दीवाली पोती जाती हैं, अगर शादी का अवसर हो तो दीवालों पर चूना लगाना आवश्यक है। तभी शादी के घर की रौनक बनती है। आदमी अपनी आमदनी के हिसाब से विवाह में खर्च करता है। अगर आमदनी कम हो तो भी रौनक पूरी होनी चाहिए। तभी विवाह का आनंद आता है। ग्रामीण अंचल में विवाहादि अवसरों पर दीवालों पर वर-वधू का नाम लिखना आवश्यक समझा जाता है। ऐसा मैने कई प्रदेशों के गांवों में देखा है। यहाँ भी घर की दीवालों पर वर-वधु के रंग बिरंगे नाम लिखे हुए थे। कम्प्यूटर प्रिंटिंग के कारण पेंटरों का धंधा चौपट हो गया। पेंटरों से साईन बोर्ड या अन्य लेखन-चित्रण कार्य कराने की बजाए लोग फ़्लेक्स बनवाना उचित समझते हैं। दीवाल लेखन देखने के बाद थोड़ी प्रसन्नता तो मिली कि पेंटरों के लिए अभी गाँव में काम बचा है। जिससे रोजगार चल सके।  | | चूल्हा निर्माण |
सुबह के समय गाँव में सभी व्यस्त रहते हैं, बहारी झाड़ू, पानी भरना, नहाना-धोना और मंदिर पाठ-पूजा नित्य का कार्य है। रास्ते में ही झोपड़ी के नीचे एक महिला चूल्हा बनाने के लिए धान के भूसे के साथ मिट्टी सान रही थी। शहरों से और कस्बों से तो लकड़ी का चूल्हा गायब ही हो गया है। गैस ने लकड़ी के परम्परागत चूल्हे को चलन से बाहर कर दिया। यह देख कर खुशी हुई कि गांवों आज भी चूल्हे का चलन है। गृह्स्थ का सारा जीवन इसी चूल्हे के चक्कर में खप जाता है। चूल्हे पर चर्चा चल रही थी तो मैने द्वारिका प्रसाद जी से कहा कि कुछ साल पहले मैने चूल्हे पर एक आलेख लिखा था। जो बहुत सारे अखबारों एवं पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हुआ था। चर्चा होने पर उन्होने कहा कि "मैं भी अब चूल्हे पर लिखुंगा। मेरे दिमाग में भी आईडिया आया है।"  | | गाँव की दुकान एवं दुकानदार |
गाँव की छोटी सी दुकान में दैनिक उपयोग की सभी सामग्री मिल जाती है। बच्चों के लिए तो यह महत्वपूर्ण ठिकाना है। जहाँ कहीं से भी रुपया दो रुपया मिला, सीधे भाग कर दुकान में पहुंचते हैं। दुकानदार के पास भी बच्चों को लुभाने वाली सारी चीजें रहती हैं, जिन्हें दुकान के सामने प्रदर्शित करता है। चाकलेट, नड्डा, गोली, बिस्किट बच्चों को आकर्षित करने के लिए काफ़ी हैं। हमें भी जब बचपन में कहीं से आने दो आने मिल जाते थे तो सब्र ही नहीं होता था। सीधे पड़ोस की दुकान में पहुंच कर उन पैसों को ठिकाने लगा कर आते थे। दुकान की रौनक भी बच्चों से बनी रहती थी और दुकानदार भी व्यस्त रहता था। अब भी गांवों में वैसा ही माहौल है। नए जमाने का असर थोड़ा बहुत हुआ है।  | | परम्परागत नौबेड़िया किवाड़ |
ग्रामीण अंचल में घरों के दरवाजे भी सुंदर और मोहक होते हैं, जिन्हें चटक रंगों से पेंट किया जाता है। जिसकी जितनी आमदनी होती है उसके घर के दरवाजे भी वैसे ही होते हैं। दरवाजों को देख कर पता चल जाता है कि कौन कितना मालदार है। वर्तमान में शहरों के घरों में इमारती लकड़ी के पेनल डोर, बटन डोर और फ़्लश डोर का चलन है। परन्तु गांवों में अभी भी खेत की लकड़ी से ही दरवाजा बनाए जाने की परम्परा है। देशी बमरी (बबूल) की लकड़ी के दरवाजे मजबूत होते हैं। अगर बमरी के सार की लकड़ी मिल गई तो ये दरवाजे कई पीढियों तक साथ निभाते हैं। बबूल की लकड़ी में गोंद होता है, जो सूखने पर लकड़ी को लोहे जैसे मजबूती देता है। इस लकड़ी से गाँवों के बढई नौबेड़िया और ग्यारह बेड़िया दरवाजे बनाते हैं। अधिकतर घरों में नौबेड़िया दरवाजे मिलते हैं। यहां पर भी मुझे यह दरवाजे देखने मिले।  | | जैन तीर्थंकर पट |
बातचीत करते हम मंदिर तक पहुंच गए, मंदिर के बारे में पता करने पर एक लड़का दौड कर गया और मंदिर के ताले की चाबी ले आया। हम पहुंचे तो मंदिर में लगा लोहे का गेट बंद था। मंदिर में प्रवेश करने पर जैन तीर्थकंरो की स्थापित प्रतिमाओं को देखकर आश्चर्य चकित रह गया। पता नहीं ग्रामीण कब से इन प्रतिमाओं की पूजा कर रहे हैं। इन्होने भी इन प्रतिमाओं को स्थानीय देवताओं के नाम दे दिए होगें तथा इन प्रतिमाओं में अपने किसी देवता को स्थापित कर मान्य कर लिया होगा। जैन तीर्थंकरों का काले ग्रेनाईट से बना हुआ एक तो नौ प्रतिमाओं का पूरा पैनल ही है। साथ में दो देवियों की प्रतिमाएं हैं एक स्थानक मुद्रा में तथा दूसरी ध्यान मुद्रा में। इन प्रतिमाओं को स्थापित करने के लिए ग्रामीणों ने बड़ा मंदिर बना लिया है तथा नित्य पूजन हो रहा है। मंदिर दर्शन करने के पश्चात हम अपने वाहन तक लौट आए।
|
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.