(एकदा निरोप घेतल्यानंतर, पुन्हा एकदा अचानक हाती पडलेल्या माहितीचा हा वृत्तांत.. आत्मशून्यशी झालेल्या बोलण्यावर आधारित)
यशवंतकडे पाठ फिरवुन मी पुढे जायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी
नर्मदामाईच्या कृपेने डोळे भरुन आले होते. अशी व्यक्ती जिला मी केवळ १
आठवड्यापूर्वी भेटलो होतो (यशवंता सोबत त्या आधी माझे कोणतेही वैयक्तीक असे
संभाषण कधीच चालु नव्हते). त्याने माझा खर्चाचा अंदाज चुकला असताना मला
लागणार्यात सर्वच गोष्टीं ची मदत अत्यंत सढळ हाताने मी न मागताच दिली होती.
हातात काठी, स्वेटर, लुंगी, व झोपायला चटई त्यानेच घेउन दिली. निरोप
घेताना येशुने मला हवे तेवढे पैसे सोबत देण्याची तयारी (सक्ती) केली होती.
ती नाकारुन मी माझ्याकडची त्याने आधीच दिलेली ५०० ची नोटही त्याला परत
केली. पण त्याने काही सुट्टे पैसे (१०० च्या दोन नोटा व १० च्या दोन व २०
ची एक व काही नाण्यांचा खुळखुळा) मात्र माझ्याकडेच राहु दिले. आता सोबतीला
कोणच नाही, वाटेत काहीही विकत घेउन खायचं नाही, मिळालं तर गिळायच नाहीतर
पुढे जात रहायचं. अन्न शिजवत बसायचं नाही.
एकटाच मी सदाव्रत मागुन आणा, मग बिन रॉकेलची चुल पेटवायचा कुटाणा करा,
मग अन्न नीट शिजवा, जेवा, भांडी घासा व मग विश्रांती घ्या व पुढे चला. असले
वेळखाऊ उद्योग दिवसातून किमान एकदाही माझ्यासारखा आळशी माणुस एकट्याने
करणंच शक्य नाही. नर्मदामातेला जगतानंदी म्हटले जाते. तर तिच्या काठावर मी
दु:खी राहणे शक्यच नाही ती काळजी घेईल असा ठाम विश्वास असला तरी पोटातले
कावळे भल्या भल्यांच अध्यात्म केरात लोटतात. तर माझ्या सारख्या अर्ध्या
हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आंडु-पाडुंची काय गत होईल ? आज पोट पुजेचं काय
होणार? काहीही असो स्वतःच्या सिध्दांतावर विश्वास, श्रध्देवर शुध्द असे
पर्यंत ठाम रहायच असा विचार करत करत नर्मदेच्या किनार्याीने पुढे सरकु
लागलो.
तितक्यात ते ३ मस्कटीटिअर्स (टिप: आपले मागचे ओमानी म्हातारे) जराशा
अंतरावर एका काठावर विश्रांती घेताना दिसले. सुर्य डोक्यावर आल्याने
त्यांनी आता आन्हिक उरकले होते. पण त्यांनी मला थोडे पुढे चालत जा व कंटाळा
आला कि स्नान करायला थांब आम्ही पोचतोच असे सांगीतले. मला कटवण्याचा
त्यांचा इरादा आवाजात स्पष्ट दिसत होता. शेवटची भेट होताना येशुने
त्यांच्या हातात १५० रुपये बळेच कोंबले होते त्यावरुन काही काळ परिक्रमा
गाडीने करायची सोय झाली असावी.
त्यांनी आधीही बोलताना सांगीतलं होतं की काही काळ ते परिक्रमा वाहनाने
करत जाणार म्हणुन. त्यांची साथ सुटेल हे आधीच माहीत होतं. पण हे अचानक
वेगळं होणं ? रस्ता व्यवस्थीत नव्हता म्हणुन जरासा वर आलो. अजुन मोरटक्का
संपलं नव्हतं. तिथे मिलीटरीच्या गणवेशात दिसणार्या् लोकांच काहीतरी काम
चालु होतं. एकदोन समवयस्क गणवेशधारींसोबत नजरानजर झाली. त्यांच्या
चेहर्याावर काही भाव नव्हता. पण माझ्याकडे बघुन एकदोघांच्या नजरेत मात्र
छ्द्मी हास्य उतरलय असा भास मला झाला. फार चौकशी केली नाही. चालत राहीलो.
परिक्रमींचा साधारण पेहराव असा असतो. फोटो जालावरुन साभार.
सोबतच्या साहित्यामुळे आता टिपीकल परीक्रमावासीचा ड्रेसकोड आपोआप जमुन
गेला होता. बस फक्त आता माझं वय कसं वाढलेलं दिसेल याचा विचार करत होतो.
परीक्रमेबाबत काहीही गृहीत धरु नये हेच बरं. बस चालत रहायच. आई नर्मदा
वेगवेगळे अनुभव देत असते. त्यात आपलाच फायदा आहे. रखरखत्या उन्हात
नर्मदेच्या काठने मी अनेक काटे व तापलेली (असावीच) वाळु दगड गोटे
कॅनव्हासचे बूट घातलेल्या पायानी तुडवत बराच काळानंतर एका निर्जन जागी येऊन
थांबलो. दमलेलो होतो, सुर्याची जागा हेच घड्याळ मानुन अंदाज केला.
सुर्य डोक्यावरुन इतका पुढे सरकलाय म्हणजे दीड तरी वाजले असणार. तो
वाटेत एक जण भेटला "अकेली मुर्ती है"? म्हणुन कुतुहलाने विचारले. मी आपोआप
"अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो. मग तो म्हणाला "अच्छा ठीक"
करुन पुढे सरकला. चटकन मागे वळुन हसुन म्हणाला, ''ओ अच्छा आप नर्मदाजी की
बात कर रहे थे?'' म्हणुन माझ्याकडे आदराने व अजीजीने बघुन हसला व निघुन
गेला.
वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची! आधी उगाच वाटलं
होतं की आपण फारच टिपीकल उत्तर दिलयं :) तिथेच काठावर अंघोळ केली
(परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत
आहे). आरती नर्मदाष्टकक वगैरे झाले व बेंबीच्या देठापासुन शक्य तेवढा दीर्घ
"ओम्" किंचाळायचा आनंद उद्बत्ती संपे पर्यंत घेत बसलो. मस्त एकांत समोर
प्रचंड विस्ताराचे नदीचे पात्र, तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या ओमची
त्याच्याशी जुगलबंदी (ही माझी समजुत ).
वाढलेल्या श्वासाने , भोवतालच्या रितेपणामुळे, वा सतत ओम केकाटल्याच्या
प्रभावाने अचानक मी निर्वीचार बनुन मटकन खाली बसलो. बसुन राहीलो हळु हळु
अवसान आलं. नजर सभोवताली टाकली. पुढे नर्मदा वळत होती म्हणुन लोकवस्ती कुठे
लागेल याचा अंदाज येत नव्हता. चार एक किलोमीटर वर दुर एकच झोपडी दिसत
होती. पोचलो तर कदाचीत तिथेच काही खायला मिळेल अशी आशा होती.
साहित्य सॅक मधे टाकुन मी पोटभर पाणी पिले. आता थकवा जाणवु लागला. कालचे
फरसाण आपल्याकडेच ठेवले असते तर बरं झालं असतं म्हणत पुढे सरकु लागलो.
शक्यतो किनारा सोडत न्हवतो पण कधी आत येणार्याठ मोठमोठ्या घळी असतात.
काट्यांच्या झाडीचा दाटपणा प्रचंड असतो. पाण्याची पातळी वाढुन निर्माण
झालेल्या ओलीची निसरडी दलदल अथवा भौगोलीक परिस्थिती वा इतर कारणाने बरेचदा
वाट ही नदीपासुन काहीशी दुर जात लगतच्या टेकडीच्या चढ उतारांच्या आधाराने
पुढे सरकत असते.
इथे काट्यांच जंगल आडवं आलो म्हणुन मीळेलत्या वाटेने शेजारील टेकाडावर
चढलो. छोट्याशा झाडीने भरलेल्या टेकडीच्या पठारावर पोचल्यावर मी पुढची वाट
कुठे आहे याचा अंदाज घेत एका जुनाट व निर्मनुष्य भासणार्याे काटेरी
कंपाऊंडपाशी पोचलो. सहजच नर्मदे हर ची हाक दिली. व वाट पाहु लागलो, आत एक
नुकतंच बांधण्यात आलेलं छोटसं मंदीर दिसत होतं. आतुन आवाज आला अंदर आइये
पहले आसन तो लगाईये. फिर बात करते है.
आत गेलो तर मंदीरात अजुन मुर्ती नव्हती. पण टाईल्सवर राम-सीता-हनुमान
यांची चित्रे होती. शेजारी जुनी पडकी खोली होती. त्यात गेलो तर तिथे
जमीनीवरच हनुमानाची पुजा झालेली दिसत होती. सोबतीला गीता प्रेस (?) अथवा
तत्सम प्रकाशकांची साधना सिध्दीला वगैरे विषयांना वाहिलेली पुस्तके (जी
अक्षरधाराच्या प्रदर्शनातही एका ठिकाणी ठेवलेली असतात अशी) ज्यावर
हनुमानाचे चित्र होते. ती ही ठेवलेली होती. बाहेर आलो तर पलीकडे दोन माणसे
एका माणसाला लाइटच्या वायरींगमधे मदत करण्यात अत्यंत मग्न होती अन तिथुनच
कानावर शब्द आदळले "भोजन पाओगे ?"..... आई शप्पथ!
एकतर टेकाडावरती झाडीच्या आत लपलेली व बहुदा डागडुजी चालु असलेली ही
जागा आधी दिसलीच नव्हती. ज्या झोपडीत जायचे ठरवले. तिथपर्यंतची वाट बघता
किमान दोन अडीच तास लागणे स्वाभाविक वाटत होतं. मी चालायला सुरुवात करुन २०
मिनीटेही झाली नसावीत. अन समोर "भोजन पाओगे ?" पाओगे म्हणजे काय. पावणारच.
मानेने हो म्हटलं अनं मग कोणतही संभाषण झालं नाही. लगेच काम सोडुन एक जण
माझ्यासाठी जेवण आणायला त्या पडक्या खोलीत पळाला. आतील भागातुन माझ्या समोर
त्याने २ जाडजुड टिक्कड व तिखट वरण समोर ठेवले. टिक्कड म्हणजे डोमीनोझच्या
रेग्युलर साइझच्या पिझाचा बेस असतो त्या एवढा अथवा थोडा
जाडजुड व आकाराने तेवढीच अशी चुलीवर भाजलेली खमंग भाकरी होय. गव्हाचीही
करतात. आडवा हात मारला. मग भाताची विचारणा झाली. अरे यार आधी नाय सांगायचं
भातही बनवलाय ते ? ३रा टिक्कड मागितलाच नसता. आज यही रुक जाओ म्हणुन आग्रह
झाला, सर्वांनाच होतो. पण एक तर अजुन साडेपाच वाजायला बराच वेळ होता
म्हणुन म्हटलं नको, "मैय्याकी इच्छासे आगे जाना है". पुढची वाट विचारली
एकाने सोबत येऊन किनार्यााला पोचायचा रस्ता दाखवला, नर्मदे हर हर असं
मनापासुन किंचाळुन अत्यंत सद्गदीत होउन त्याला निरोप देउन चालु लागलो.
चालत होतोच. किती चालत राहीलो, कळलं नाही. नर्मदेसोबत वाटेनेही दिशा
बदलली. मी थोड्या टेकाडावर येऊन पोचलो. चला आज दुसरा दिवस उपास घडला नाही
पाय दुखत होते. पण मन प्रसन्न होतं. चालताना एका वळणावर नर्मदामातेचे मंदीर
दिसलं. जागा थोडी उंचावर होती नर्मदा काहीसी खालुन वहात होती. पांढर्याए
रंगाच साधं मंदीर समोर. छोटी दरी व लगेच नर्मदेचे विस्तृत पात्र अप्रतीम
देखावा. पण पायाचा शिनवटा जास्त प्रभावी म्हणुन चटकन मंदीराच्या छोट्याश्या अंगणात पाऊल टाकले. समोर घोरत पडलेली (?)
तीनचार कुत्री त्वरीत जागी होऊन माझ्या दिशेने प्रचंड त्वेषाने भुंकत धाऊन
आली. कुत्र्यांची पहील्यापासुनच भीती वाटत नाही. म्हणजे खास प्रशिक्षण न
दिलेल्या. रात्री अपरात्री येणार्यार जाणार्यान वाहनाच्या, लोकांच्या
अंगावर धाऊन जाणार्याी कुत्र्यांच्या लोळक्यातून मी अनेकदा एकट्यांनेच
अनेकांसमोर बिधास्तपणे गेलो आहे, आणि कोणत्याही अपयाशिवाय सहज बाहेरही
पडतो. पण इथे एक गंमत झाली.
कुत्री अंगावर आली व सवयीने मी ही मागे न हटता गेटमधुन आत पुढेच जात
राहीलो. कुत्री माझ्या भोवती कोंडाळे करुन भुंकुन भुंकुन वातावरण दणाणुन
सोडत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, मी जागेच्या
मध्य भागी येऊन इथे कोण आहे काय याचा अंदाज घेत होतो.
कारण मंदिराला लागुनच स्वयंपाक घर दिसत होतं. कुत्र्याच्या गलक्याने एक
मुलगा आतुन धावत आला. मला आतमधे पाहीले व हसुन म्हणाला नर्मदे हर बोलो, वोह
सांत हो जाएंगे. आपल्याला काय? नर्मदे हर केलं अनं ती कुत्री ताबडतोब
आल्या जागी परतुन अंग गुरफटुन उताणी पडली. मला गंमत वाटली. त्याने विचारले
कौनसा जिला ? म्हटलं महाराष्ट्र. त्याने भुवया उंचाउन वहां से आये हो ?
म्हटलं हो. अकेला ही हुं. मंदिरात नर्मदामाईचे दर्शन घेतले. निघालो तर
तेव्हड्यात त्याने चहा बनवला होता. आवड नाही पण नकारही देत नाही. त्याला
विचारलं परिक्रमावासीसांठी संध्याकाळी थांबायची सोय कुठे आहे? तो म्हटला
थोडं पुढे टोकसर म्हणुन एक गाव आहे. तिथे मोठा आश्रम आहे. थांबता येईल.
जेवण दुपारी असते पण संध्याकाळी स्वतःला बनवावे लागेल.
३ टिक्कड पोटात होते. रात्रीच्या जेवणाची चिंताच नव्हती. वाटेतली लहान
गावे, वस्त्या पार करत ४.३० ला टोकसरला पोचलो सांगितलेल्या आश्रमात गेलो.
अत्यंत रमणीय व प्रशस्त जागा मोठी व स्वच्छ धर्मशाळा परंतु ओस पडलेली.
आश्रमात गेलो. भगव्या वस्त्रात असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रेमाने
स्वागत केले. कोण, कुठ्ले, केव्हा सुरु केली परीक्रमा वगैरे झालं.
त्यांच्याकडुन प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. त्यांनीही विचारलं भोजन
पाओगे ? आयला ! चमत्कारच आहे.
मी तर ऐकलं होते दुपारी बारा एकलाच जेवण असतं इथं म्हणुन. म्हटल
"रातको". अन त्यांनी दिलेल्या स्वच्छ अशा खोलीत येऊन आडवा झालो. अर्धा तास
झाला अन त्याने माझ्या खोलीत अजुन एका परिक्रमावासीला आणलं. हसत म्हणाला ये
भी अकेले है और महाराष्ट्रं से ही है. तो आणी मी एकदमच हसलो. कोण कुठले
वगैरे झालं. मुंबैकर होता. म्हणाला तुमच्या सोबतचा कुठाय? म्हटलं तो
सोबतीसाठीच होता. परतला मोरटक्याहुन. हा म्हणाला तुम्हाला ओंकारेश्वरला
पाहिलं होतं. मी सुध्दा थोड्या वेळाने तिथेच परिक्रमा सुरु केली. मी त्याला
ओळखणे शक्यच नव्हते.
त्यांचं वय ६०. त्यांच्या कमरेपर्यंत येईल अशी भलीमोठी जाडजूड सॅक
पाठीला होती. पुन्हा मनात म्हटलं हिमालयात नाही परीक्रमेत जातोय याचा याला
नक्कीच विसर पडलाय. पण माणुस तरतरीत होता बोलायला. बसला आणि गप्पा सुरु.
परिक्रमा का सुरु केली? त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले मी एकांतात
राहून बर्यापच काळापासून एका देवतेची साधना केली आहे. गेली दहा वर्षे मी
कूटूंबापासुन दुर आहे (संपर्कात आहेच पण राहतो दुसरीकडे). त्या देवतेचं
मंदीरही बांधलं आहे व पुजारीही आहे. अनेक लोक त्यांच्या अडचणी घेऊन गेले व
त्यांना फायदा झाला. पण आयुष्यभर जे त्यांनी मिळवलयं ते लोकांना वाटायची
आता वेळही आली आहे म्हणुनच परिक्रमा.
सध्या गाडी, घर, उत्तम नोकरी वगैरे सर्व काही आहे. पण साधनेत तीव्र
स्फूर्ती आल्याने व नंतर परिक्रमेसाठी अनुकूल गोष्टीग आपोआप घडत गेल्याने
ते परीक्रमेत कसे आले त्याची माहीतीही त्यांनी दिली. अर्थातच ते जे बोलले
ते माझ्यासाठी क्रिप्टीक होते वा सविस्तर नव्हते. पण मुळात मी स्वतः
परीक्रमेचा संकल्प उघड करणे वा न पाळणे याबाबत कमालीचा संवेदनशील असल्याने
याबाबतीत कधीच कोणत्याही परीक्रमावासीच्या चौकशीच्या खोलात गेलो नाही.
माझ्या बाबत बोलाल तर असा प्रयत्न झाल्यास मी सरळ थापा ठोकुन दिल्या आहेत.
ते मला थोडे अस्वस्थ भासले. कारण त्यांची पाठ फार दुखत होती मी त्यांना
त्यांची राक्षसी सॅक इथंच टोकसरच्या आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला व केवळ
मोजकेच सामान सोबत बाळगण्यास सांगितले. इतक्यात आश्रमाची व्यवस्था पाहणारे
प्रेमळ गृहस्थ आत येऊन आम्हाला म्हणाले भोजन पाओगे? माझं तेच उत्तर
"रातको". तर, "अरे नारायण कब की रात हो गयी" म्हणुन खेकसले. सुर्यास्त होऊन
बराच वेळ झाला होता. ५.४५ ला त्या दिवशी सुर्यास्त होता. म्हणजे सात
वाजायला आले असावेत. त्यांचं बरोबरच आहे तिकडे ती वेळ नक्कीच रात्रीची
होती.
मी हो म्हटल्यावर आम्हाला त्यांनी भाजी आणि टिक्कड पोटभर खायला दिले. संध्याकाळी मंदीरात पुजेला जायचे
त्राण नव्हतेच. म्हणुन नर्मदा मातेची पुजा वगैरे आटोपुन तो त्याने सोबत
आणलेल्या स्लिपींग बॅगच्या गुहेत शिरुन चेन ओढून घेतली तर मी माझ्याकडच्या
चटईवर छोटी सतरंजी टाकून त्वरीत निद्राधीन झालो.
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी
लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात
संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही
(सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला).

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.