Wednesday, June 17, 2020

महांकालेश्वर

शिवशंभोचे 'महाकाल'रूप

shiv shankar
उज्जैनचे हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, आणि यांनीही केली आहे.
येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.

येथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. ''दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासीय वैतागले होते. त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ज्योतिच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला. भक्तांच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैनमध्ये स्थायिक झाले.'' अशी कथा ‍शिवपुराणात आहे. 

येथील शिवलिंग जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते. ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो. पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते. या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात.

भस्मारतीवेळी पूजा करण्यासाठी साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जाण्याची परवानगी नाही. पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महिलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात. यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात.

''पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने (चिताभस्म) भोलेनाथाला सजविले जात असे. परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख (चिताभस्म) मिळाली नाही. त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते. तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.'', अशी दंतकथा आहे.

महाकाल मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उज्जैनचा राजा महाकाल आपल्या जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात फिरायला निघतो, अशी समजूत आहे. या दिवशी भगवान शिवाचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. शेवटच्या श्रावण सोमवारी महाकालची शाही मिरवणूक काढली जाते. यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभाग घेतात. सगळीकडे महाकालचा जयघोष चाललेला असतो.

''उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल' असे पूर्वी सांगितले जात असे. यामुळे उज्जैनच्या सीमेमध्ये कोणताही राजा-महाराजा रात्री थांबत नसे, असेही बोलले जाते. म्हणूनच उज्जैनवर शिंदे घराण्याचे राज्य होते, तेव्हाही रात्र काढण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा शहराच्या सीमेबाहेर बांधला होता, अशी दंतकथा आहे.

आरतीचा वेळ- श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात. ही वेळ भस्मारतीचा असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते. सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते. संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.)

ShrutiWD


उज्जैनला जाण्यास योग्य काळ- वर्षभर महाकाल मंदिरात भक्तांची रांग लागलेली असते, परंतु शिवरात्र आणि श्रावण महिन्यात या नगरीचे रूप निराळेच असते. सगळीकडे गर्दी असते. रस्त्यावर खांद्यावर कावड घेतलेले लोक नजरेस पडतात. संपूर्ण शहर शिवभक्तीत मग्न झालेले असते. श्रावणात येथे श्रावण महोत्सव होतो.

कसे जावे- रस्त्याने- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपूरमार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चितोडमार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वालियर-दिल्लीमार्गे, उज्जैन-देवास-भोपाळमार्गे, उज्जैन-धुळे-नाशिक-मुंबईमार्गे.

रेल्वे मार्ग- उज्जैनहून मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर रेल्वे मार्ग), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग), उज्जैन-इंदूरमार्गे ( मीटरगेजने खांडवा रेल्वेमार्ग), उज्जैन-मक्सी-ग्वालियर-दिल्लीमार्गे.






















































 

हवाई मार्ग- उज्जैनपासून इंदूर विमानतळ जवळपास 65 किलोमीटरवर आहे. 
राहण्याची व्यवस्था- उज्जैनमध्ये चांगल्या हॉटेलपासून सर्वसामान्यांना परवडेल अशा धर्मशाळा आहेत. तसेच महाकाल समितीची महाकाल आणि हरसिद्धी मंदिराजवळ धर्मशाळा आहेत. या धर्मशाळेत वातानुकूलित, साध्या खोल्या आणि हॉलही उपलब्ध आहेत.

हिंगोली तालुक्यातील पर्यटनस्थळे

मराठवाडा विभाग राज्य पुनर्रचनेच्या निजामकालीन संस्थानात समाविष्ट होता. हिंगोली उपविभाग हा तत्कालीन ब्रिटीश राजवटीच्या विदर्भ भागास लागून असलेला भूभाग निजाम संस्थानच्या सिमेवरील भाग म्हणून ओळखला जात होता. हिंगोली येथे तत्कालीन निजामाचे लष्करी ठाणे होते. लष्करी तुकड्या, लष्कराचे दवाखाने, घोडदळ व लष्कराच्या उपयोगासाठी जनावरांचा दवाखाना येथे होता. इ.स. 1803 मध्ये टिपू सुलतान-मराठा युद्ध व इ. स. 1857 मध्ये नागपूरकर भोसले यांची लढाई जनतेने पाहिली व अनुभवली आहे. आर्मी व मराठी सेनेने इंग्रजांचा केलेला यशस्वी प्रतिकाराचीही येथील जनता साक्षी आहे. हिंगोली येथे असलेल्या लष्करी छावणीमुळे हे शहर पूर्वीपासून हैदराबाद राज्यातील महत्वाचे शहर म्हणून प्रसिद्धी पावलेले आहे.
लष्करी ठाणे असलेल्या या शहरातील वस्त्यांना पूर्वीपासून प्रचलित असलेली पलटण, रिसाला, तोफखाना, पेन्शनपुरा, सदर बाजार ही नावे आजही कायम आहेत. हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असून दसरा महोत्सवाची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
  स्वातंत्र्योत्तर काळात 1956 साली झालेल्या राज्य पुनर्रचनेत मराठवाडा विभाग तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन परभणी जिल्ह्याचा हा भाग महाराष्ट्र राज्याचा घटक झाला. महाराष्ट्र राज्याच्या 39 व्या वर्धापनदिनी म्हणजे 1 मे 1999 रोजी आकाराने विस्तीर्ण असलेल्या परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती घेऊया...
इतिहास : प्राचीन काळात विंगुली, विंग मुल्ह, लिंगोली असा उल्लेख हिंगोलीबद्दल आढळतो. इ. स. ४९० मध्ये वाकाटक घराण्या-तील सर्वसेन या राजाने वत्सगुल्म नावाची एक शाखा स्थापन केली. या शाखेची राजधानी तत्कालीन वत्सगुल्म (आताचे वाशिम) राज्यातील नर्सी परगण्यातील हिंगोली एक गाव होते. नंतरच्या काळात कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या घराण्यांच्या सत्ताही या प्रदेशात राज्य करीत होत्या. जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रास आमर्दकक्षेत्र म्हटले जात असे, असा उल्लेख राष्ट्रकूटांच्या ताम्रपटात आढळतो. मध्ययुगीन काळात या प्रदेशावर मोगल, इमादशहा, आदिलशहा, निजामशहा यांचे आधिपत्य होते. शिखांचे दहावे व अंतिम गुरू गुरुगोविंदसिंह हे पंजाबमधून मोगल बादशहा बहादूरशहा याच्यासमवेत दक्षिणेत आले असता १७०८ मध्ये त्यांनी जिल्ह्यातील वसमत येथे तळ (डेरा) उभा केला.
     सालारजंग या निजामाने ब्रिटिशांसमवेत केलेल्या तहानुसार १८५३ मध्ये परभणी जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यात हिंगोली जिल्ह्यातील प्रदेशाचा समावेश होता. १८५९ मध्ये जिल्ह्यातील वसमत येथे रोहिल्यांचे आणि ब्रिटिशांचे युद्ध झाले. हैदराबादचा निजाम व ब्रिटिश यांच्या राज्याच्या सीमा सांप्रतच्या हिंगोली जिल्ह्यात परस्परांना स्पर्श करीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हैदराबाद संस्थानाने येथे लष्करी छावणी उभारली होती. १९०३ पर्यंत ही छावणी हिंगोली शहरात अस्तित्वात होती. १९३६ पर्यंत हिंगोली जिल्ह्याचा समावेश नरसी परगण्यात होत होता. १ मे १९९९मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय सोयींसाठी जिल्ह्यात दोन उपविभाग असून हिंगोली उपविभागात हिंगोलीसह कळमनुरी व सेनगाव या तालुक्यांचासमावेश होतो, तर वसमत उपविभागात वसमत आणि औंढा नागनाथ यातालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या निर्मितीबरोबरच जिल्हा परिषदेची स्थापना झाली असून पाचही तालुक्यांमध्ये पंचायत समित्या कार्यरत आहेत. हिंगोली, वसमत व कळमनुरी या तीन नगरपरिषदा आहेत. जिल्ह्यात एकूण ७१० महसुली गावे असून ५६५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात विधानसभेचे तीन, तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. 

पाण्याची कमतरता आणि जंगलाची विरळता यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार कमी प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी येथे आढळतात. खडकाळ व टेकड्यांच्या जंगलभागात बिबळ्या आढळतो. इतरत्र अभावाने आढळणारा रोही हा प्राणी येथे विपुलतेने आढळतो. पक्ष्यांमध्ये कबूतर, सफेद तितर, काळे तितर तसेच अल्प प्रमाणात मोर आढळतात. येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणांच्या बाजूला स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात आढळतात. या परिसरात हिरवे कबूतर (हरोळी) हा महाराष्ट्राचा राज्यपक्षीही आढळतो. हिंगोली जिल्हा सापांच्या प्रजातींबाबत संपन्न असून त्यात मण्यार, पट्टेरी मण्यार, नाग, घोणस, फुरसे, गवत्या, हरणटोळ, पाणसाप, मांजरसाप इ. सापांचे बहुसंख्य प्रकार आढळतात.
      हिंगोलीला वाङ्मयीन पार्श्वभूमी लाभली असून येथील नाटककार व नट श्रीपाद नृसिंह बेंडे प्रसिद्ध आहेत. मराठी कथेत मोलाची भरघालणारे बी. रघुनाथ हे मूळचे हिंगोलीचे होत. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, कीर्तनकार व प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील शेवाळे हे होय. एकोणिसाव्या शतकातील सुप्रसिद्ध संत पूर्णानंद महाराज यांचे वास्तव्य शेवाळे येथे होते. ख्यातनाम मराठी साहित्यिक व विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे जन्मस्थळ वसमत तालुक्यातील कुरुंदा हे आहे. वासुदेव, वाघ्यामुरळी, गोंधळी या समाजघटकांद्वारे जिल्ह्यात लोकसाहित्य जपले गेले आहे. येथील समाजजीवनावर वर्‍हाडी वळणाचा प्रभाव असून भाषेवर वर्‍हाडी भाषेचा प्रभाव आहे. मुसलमानी अमलाखाली हा प्रदेश राहिल्याने येथील भाषेत उर्दू शब्द आढळतात. 

महत्त्वाची स्थळे : भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ मंदिरासाठी औंढा नागनाथ हे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. मंदिराचे बांधकाम देवगिरीच्या यादवांच्या काळातील म्हणजे तेराव्या शतकातील आहे. मंदिराचा सर्वांत प्राचीन भाग त्याचे अधिष्ठान (जोते) असून ते चार थरांमध्ये आहे. कीर्तिमुख, गज, अश्व, व नर असा थरांचा क्रम असून नर थरात मानवी शिल्पाकृती व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप असे भाग दिसतात. बाहेरील बाजूस अर्थमंडप व मुखमंडप असून त्यांच्या पायऱ्यांच्या कठड्यावर हत्ती व घोडे यांच्या शिल्पाकृती आहेत. त्यामुळे देऊळ मिरवणुकीच्या रथाप्रमाणे दिसते. प्राचीन काळी वसुमती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत येथे सुन्नी पंथीय मुशाफीर शहाचा दर्गा तसेच शुकानंद महाराजांचा मठ आहे. शिरड शहापूर येथे मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. जिल्ह्यातील नर्सी हे संत नामदेवांचे जन्मस्थान म्हणून पर्यटकांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांचे वास्तव्य औंढा नागनाथ येथे होते. यांशिवाय हिंगोली, कळमनुरी, कुरुंदा, गिरगाव, डोंगरकडा, वसमत, एरंडेश्वर, शेवाळे ही इतर महत्त्वाची स्थळे आहेत.

हिंगोली शहर

हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या शहरास निजामकालीन लष्करी ठाणे म्हणून ऐतिहासिक महत्व आहे. परभणी शहरापासून 78 कि. मी. तर नांदेडपासून 90 कि.मी. अंतरावर हिंगोली शहर आहे. हिंगोली रेल्वे मार्गाने जोडलेले आहे तसेच हे या भागातील प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.

एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यातील हिंगोली हे एक कापूस खरेदी-विक्री व्यवहाराचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे या परिसरात जिनींग प्रेसींग फॅक्टरीज अस्तित्वात आहेत. शहरापासून जवळच जलेश्वर हे मंदिर विस्तीर्ण तळ्याच्या परिसरात वसलेले असून या तलावात विविध रंगाची कमळाची मनमोहक फुले असल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.

दसरा महोत्सव

हिंगोली शहरात स्वर्गीय मानदासबाबा यांनी 151 वर्षांपूर्वी दसरा महोत्सव सुरू केला. दसरा महोत्सवानिमित्त 10 दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनपर तसेच प्रदर्शनी व रावणदहन आदी उपक्रम राबविले जातात. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षण ठरला आहे. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सदगुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.
हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठाच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा सुरु झाली, असे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
सन 1855 पासून परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पोर्णिमेला बांसाफोड या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक असा 9 ते 10 दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.

हिंगोली जिल्हा पर्यटन स्थळे

 औंढा नागनाथ :-

भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे 8 वे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मुख्य मंदिराभोवती बारा ज्योतिर्लिंगाचे लहान मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. औंढा नागनाथ तालुक्याचे ठिकाण असून हिंगोली पासून 24 कि.मी. अंतरावर आहे. परभणी व नांदेड शहरापासून औंढा नागनाथ साधारणत: 55 ते 60 कि.मी. अंतरावर आहे. राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास योजनेत औंढा नागनाथचा समावेश करण्यात आला असून याठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून भक्तनिवास, बालोद्यान, रस्ते, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 
   मंडळी, आपल्या महाराष्ट्राला “संतांची भूमी” म्हटलं जातं ते काही उगीच नाही ! इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत चोखामेळा यांच्यासारखे अगणित संतमहात्मे होऊन गेले, ज्यांनी साक्षात विठ्ठलाला येणं केलं. त्यांच्यातीलच एक संत नामदेव. संत ज्ञानेश्वरांच्या उपदेशावरून ते गुरु करण्यासाठी औंढा नागनाथ मंदिरात आले. त्यांनी पाहिलं की एक सद्गृहस्थ शिवलिंगावर पाय ठेवून आराम करत आहेत. “हा भगवान शंकरांचा अपमान आहे”, असं म्हणत नामदेवांनी त्यांना पिंडीवरून पाय काढण्यास सांगितले. त्यावेळी ते सद्गृहस्थ म्हणाले, “तुम्हीच माझे पाय उचलून दुसरीकडे ठेवा.” संत नामदेवांनी लागलीच तसं केलं, पण भूमीतून दुसरी पिंड वर आली. संत नामदेवांनी त्यांचे पाय तिथून काढून तिसरीकडे ठेवले, तर तिथे तिसरी पिंड वर आली. असं करत करत संपूर्ण मंदिर शिवलिंगांनी भरून गेलं. त्यावेळी संत नामदेवांनी त्यांना लोटांगण घातलं व शरण गेले. हेच संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर ! त्यांच्याच उपदेशांनी संत नामदेवांचे जीवन तरले.



एके दिवशी संत नामदेव या मंदिरात पूजेसाठी आले होते. त्याकाळी जातीपातीचं खूप मोठं अवडंबर माजलं होतं. आणि आपले संत हे ब्राम्हण नव्हते. संत नामदेव तर शिंपी होते. त्यामुळे मंदिरातील ब्राम्हण पुजाऱ्यांनी त्यांना तिथून उठण्यास सांगितलं. ते म्हणाले, “तुम्ही मंदिरात कसे आलात ? देवाला भ्रष्ट केलंत. मंदिराच्या मागे जाऊन जे काही कीर्तन करायचं ते करा. इथे आमच्या पूजेत व्यत्यय नको.” संत नामदेवांना खूप वाईट वाटलं. ते शांतपणे तिथून उठले व मंदिराच्या मागील बाजूस बसून पूजा करू लागले. त्यांची ही भक्ती आणि निष्ठा बघून भगवंताने चक्क मंदिराचं मुख फिरवलं. पूर्वाभिमुख असलेलं मंदिर पश्चिमाभिमुख झालं, ते आजतागायत तसंच आहे. हेच कारण आहे की, या मंदिराला औंढा (उलटा) नागनाथ मंदिर नाव पडलं व तेच पुढे प्रचलित झालं. यापूर्वी ते नागनाथ मंदिर म्हणूनच ओळखलं जायचं. मंडळी, यावरून आपल्याला एकाच शिकवण मिळते की भगवंताला सगळीच समान आहेत. त्याच्याकडे उच्च-नीच असा भेद नाही. जो त्याची निष्ठेनं भक्ती करेल त्याच्याकडे तो आनंदाने जातो. म्हणूनच म्हटलंय, “भगवंत भावाचा भुकेला | भावार्थ पाहुनी भुलला ||”
     मंडळी, असं हे बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ मंदिर, जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर फार पुरातन आहे, अगदी द्वापारयुगापासून ! असं म्हणतात की आपल्या वनवासकाळात पांडव इथे काही काळ वास्तव्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाई जवळच्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी जात असत. पाणी प्यायल्यानंतर त्यांचं दूध आपोआप त्यामध्ये वाहून जात असे. जणू काही गाई सरोवराला ते भेट म्हणून देतायत. एके दिवशी भीमाने हे दृश्य पाहिले व ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिराच्या कानावर घातले. त्यावेळी दह्र्मराज युधिष्ठिर म्हणाले, “नक्कीच इथे एखादी दिव्य शक्ती आहे.” त्यांनी ज्या दिशेने पाणी वाहत होतं तिथे शोध घेतला, तेव्हा त्यांना नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी इथे मंदिर बांधले. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर सात मजली व भव्य होते. पण मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने ते उध्वस्त केले. नंतर केवळ मंदिराचा खालचा भाग शाबूत  होता.

 
त्यावेळी देवगिरीच्या यादवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच मंदिराचा खालचा व कळसाचा भाग वेगवेगळे दिसतात. मंडळी, औंढा नागनाथला “दारुकावन” असंही म्हटलं जातं. एका प्रचलित आख्यायिकेनुसार इथे एक दारूका नावाची राक्षसीण राहत होती. ती स्थानिकांना खूप त्रास द्यायची. त्यावेळी त्यांनी भगवान शंकराला साकडं घातलं व दारूकाच्या त्रासापासून सुटका मिळवून देण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी दारूकाला ठार केलं, पण मरण्यापूर्वी तिने भगवान शंकरांकडे “तिचं नाव सतत आठवणीत राहिल व त्या ठिकाणाशी जोडलं जाईल” असा वर मागितला. भगवान शंकरांनी “तथास्तु” म्हटलं व ते “दारुकावन” या नावाने ओळखलं जाऊ लागलं. एव्हाना आपल्याला कळलं असेल कि मंदिर जितकं प्राचीन असतं तितका त्याचा इतिहास मोठा असतो आणि औंढा नागनाथ मंदिरही त्याला अपवाद नाही. 


 

हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर त्यावरील कोरीवकामामुळे जास्त लोभस दिसतं. मंदिराच्या शिल्पपट्टीवर शिवपार्वती, श्रीविष्णू, ब्रम्हदेव, श्रीदत्तात्रेय, नीळकंठेश्वर, गणपतीबाप्पा, गौतम बुद्ध, यती इत्यादींच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मधला गोलाकार मंडप व त्यावरील घुमट आठ अष्टकोनी कलाकुसरींच्या खांबांवर उभारलेला आहे. औंढा गावाच्या दक्षिणेकडील मंदिरातील कनकेश्वरी हि नागनाथपत्नी मानली जाते. औंढा नागनाथ हे आठवं (आद्य) ज्योतिर्लिंग मानलं जातं. त्यामुळे त्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. 
 नागनाथ मंदिरातील भिंतीवरील शिल्पपट्ट, औंढा नागनाथ.
नागनाथ मंदिरातील भिंतीवरील शिल्पपट्ट, औंढा नागनाथ.
 ६०००० चौरस फूट क्षेत्रावर बांधलेलं हे विस्तीर्ण मंदिर म्हणजे भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराची आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात एक मोठा पराकोट असून त्याला चार प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. हेच मुख्य प्रवेशद्वार ! मंदिराच्या आवारात एक पायविहीरही आहे. तिला नागतीर्थ असंही म्हणतात. पूर्वीचे लोक तिलाच “सासू-सुनेची बारव” असं संबोधतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहेत. या सभागृहातून चिंचोळ्या वाटेने कोरलेल्या दगडी पायऱ्या उतरून खाली जायचं. चार दगडी खांबांच्या मध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे. शिवाय मंदिराच्या विस्तृत आवारात इतर ठिकाणच्या ज्योतिर्लिंगांचीही लहान लहान मंदिरं आहेत. महाशिवरात्र आणि विजयादशमीला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. या काळात मंदिराच्या परिसराला उत्सवाचं स्वरूप आलेलं असतं.

     मग एकदातरी हिंगोलीतील हे वैभव “याचि देही याचि डोळा” न्याहाळायला हवंच. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकासाचा प्रस्ताव मंदिर प्रशासनाने तयार केलेला आहे. येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह पर्यटकांना राहण्यासाठी उपलब्ध आहे. मंदिरापासून 1 कि.मी. अंतरावर प्रेक्षणीय असे नागनाथ उद्यान आहे.
औंढा नागनाथ मंदिराकडे कसं पोहोचायचं ?
औंढा नागनाथ मंदिर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात स्थित आहे. तिथे पोहोचण्यासाठी औरंगाबाद हे जवळचे विमानतळ तर परभणी हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. तसेच परभणी, लातूर व नांदेडहून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय खाजगी जीप करूनही इथे पोहोचता येईल. राहण्यासाठी भक्त निवास उपलब्ध आहे, पण अगदी पायाभूत सुविधा आहेत. इथे खाण्यापिण्यासाठी लहान-मोठे हॉटेल्सही उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवास करताना आपल्या राहण्याची, खाण्याची नीट तजवीज करूनच निघा.

नर्सी नामदेव

   नर्सी हे संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असून त्यांचा इ.स. 1270 मध्ये जन्म झाला होता. नर्सी हे कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीस व आषाढी एकादशीस मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. संत नामदेव महाराज हे शिख समाजाचे आदरणीय संतपुरूष असल्याने नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या पुढाकाराने येथे गुरूद्वारा, नदीवरील घाट वाहतुकीचे रस्ते, विश्रामगृह आणि व्यापारी संकुल बांधण्याची योजना कार्यान्वित होत असून त्यात महाराष्ट्र शासनाचे मोठे योगदान आहे..सरकारने नरसी येथील पर्यटनस्थळ बांधले आहे. पंजाब मधील त्यांच्या अनुयायांनी,बाकीचे भारताचे अनेक अनुयायी आहेत जे नार्सीला वारंवार येतात शीख अनुयायी नरसी येथील गुरुद्वारा बांधत आहेत आणि त्यांनी संत नामदेव यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.संत नामदेवांचे जन्मस्थळ, नार्सी, तालुका हिंगोली.संत नामदेवांचे जन्मस्थळ, नार्सी, तालुका हिंगोली.

     नर्सीचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला असून या निधीतून जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, यात्री निवास, वाहनतळ, सांस्कृतिक सभागृह, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह पाणीपुरवठा, बाग-बगीच्या, विद्युतीकरण आदी कामे सुरू आहेत. हिंगोली शहरापासून 17 कि.मी. अंतरावर नर्सी नामदेव असून प्रती पंढरपूर म्हणून नर्सीची ओळख आहे.

आसेगाव

हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव ता. वसमत हे गाव जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान आहे. या गावात संपूर्ण महाराष्ट्रातील व इतर भागातील जैन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

सिद्धेश्वर धरण

औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे. सदर धरणाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची योजना पूर्ण झाली असून यामध्ये बाग बगीचा, सुशोभीकरण, पर्यटक निवास, अंतर्गत रस्ते व पोच मार्ग निर्माण करण्यात आले आहेत.सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर.सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर.
 याशिवाय औंढा व वसमत तालुक्याच्या सिमेवर बाराशीव हनुमान मंदीर असून मंदिराची जागा परिसरातील 12 गावांची सीमा एकाच ठिकाणी येतात म्हणून बाराशीव हनुमान मंदीर असे नाव पडले आहे. तसेच सेनगाव तालुक्यातील खैरीघुमट येथे हटकर समाजाचे पुरातन मंदीर आहे.

औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथील महादेव मंदीर, सिद्धनाथ मंदीर, शिरड शहापूर येथील जैनमंदीर, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जटाशंकराचे मंदीर व लमाणदेव यात्रा, हजरत सय्यद नुरोद्दीन ऊर्फ नुरीबाबा यांचा दर्गा व हिंगोली शहरातील चिराग शहा तलाव आदी धार्मिक व इतर प्रेक्षणीय स्थळे पाहता हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.

गुरु गोविंदसिंग गुरुद्वारा, वसमत.
गुरु गोविंदसिंग गुरुद्वारा, वसमत.



दिगंबर जैनची मूर्ती

मल्लिनाथ दिगंबर जैन

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरद शहापूर गावात जैन समाजातील सर्वात ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. 300 वर्षे जुने असलेले लॉर्ड मल्लिनाथ यांचे…


श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, शिरड शहापूर, तालुका औंढा नागनाथ.
श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, शिरड शहापूर,
दक्षिणमुखी महादेव मंदिर, अंजनवाडा.
दक्षिणमुखी महादेव मंदिर, अंजनवाडा.




परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील दख्खन पठारावरील व गोदावरी नदीखोऱ्यातील एक जिल्हा. क्षेत्रफल १२,४८९ चौ. किमी. विस्तार १८° ५८’ उ. ते २०° २’ उ. व ७६° ४’ पू. ते ७७° ४२’ पू. याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा (सु. १६०·९३ किमी.) व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी (सु. ६४·३७ किमी.) या नद्या वाहतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे.

Parbhani District Information in Marathi

 जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो.

 

शासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे सेलू (सै़लू) व हिंगोली असे दोन विभाग केले आहेत. सेलूमध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी आणि परतुर हे तालुके व हिंगोलीमध्ये हिंगोली, वसमत (बसमथ), कळमनुरी व जिंतूर हे तालुके येतात. परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. परभणी जिल्हयाच्या पुर्वेला अजिंठा पर्वतरांगा (जिंतुर तालुक्यातुन जातात) आणि दक्षिणेकडे बालाघाटच्या पर्वतरांगा दिसुन येतात.

     गोदावरी ही जिल्‍ह्यातील  प्रमुख नदी आहे. ती पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्‍यातून पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे नांदेड जिल्‍ह्यात प्रवेश करते. जिल्‍ह्याच्‍या वायव्‍येकडील मध्‍य भागातून पूर्णा नदी व तिच्‍या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. सेलू व जिंतूर तालुक्‍याचा काही भाग दुधना नदीच्‍या खो-यात येतो. जिल्‍ह्यातील लोकांचा प्रमुख व्‍यवसाय शेती आहे.

     परभणी हा जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानच्‍या मराठवाडा विभागातील  पाच जिल्‍हयांपैकी एक जिल्‍हा होता. या जिल्‍ह्याचा उल्‍लेख  'प्रभावती' ह्या नावानेही केल्‍याचे आढळून येते. मराठवाड्याच्‍या इतिहासात परभणीची परंपरा फार जुनी असून ती अश्‍म युगापर्यंत पोहोचते. प्राचीन भारताच्‍या इतिहासात अश्‍मयुगात गोदावरीच्‍या खो-यातील प्रदेशाची फार भरभराट झाली असावी, असा संशोधकांचा तर्क आहे. अशोकाच्‍या दक्षिणेतील स्‍वारीने परभणीच्‍या विकासाला साह्य केले. हा भाग काही वर्षे देवगिरी येथील यादवांच्‍या अधिपत्‍याखाली होता. चौदाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीस अल्‍लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केल्‍यानंतर परभणीचा परिसर त्‍याच्‍या ताब्‍यात गेला. महंमद तघलकाच्‍या मृत्‍यूनंतर  हैद्राबादचे स्‍वतंत्र राज्‍य अस्‍तित्‍वात येईपर्यंत परभणी हे मोगल साम्राज्‍याचे अंग होते.

        इसवी सनापूर्वी सातवाहनांच्‍या काळात गोदातीरी  महाराष्‍ट्र सारस्‍वत आणि संस्‍कृती यांचा जो उद्गम झाला, त्‍याचा वारसा परभणी जिल्‍हयाला लाभला होता. महर्षी अगस्‍तीच्‍या दक्षिण दिग्‍विजयाने या जिल्‍ह्यात विविध तीर्थे  निर्माण केली आहेत. पौगंड, पोलस्‍व यासारखे  तपोधन, गोरख, गैबी आणि गहिनीनाथ यासारख्‍या श्रेष्‍ठ नाथपंथियांनी जिल्‍हयात वास्‍तव्‍य व साधना केल्‍याचे उल्‍लेख धर्मग्रंथात आहेत. परभणी जिल्‍हा संत-महंताची भूमी आहे. जिल्‍ह्यात बरीच धार्मिक स्‍थळे आहेत. जिल्‍ह्याला प्रदीर्घ परंपरा असल्‍याने अनेक ऐतिहासिक स्‍थळेही आहेत. 

PARBHANI DIVISION bus stand depot contact number

Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id

Office

20 Divisional Controller Parbhani, (02452) 223127/ 234148 dcstparbhani@gmail.com

1 Divisional.Traffic Officer Parbhani Division, (02452) 220422

2 Divisional. Accounts Officer Parbhani Division (02452) 220482

3 Divisional. Personnel Officer Parbhani Division (02452) 220460

4 Labour Officer Parbhani Division (02452) 220460

1 Depot Manager Parbhani bus stand depot contact number (02452) 223337

2 Depot Manager Jintur bus stand depot contact number (02457) 220036

3 Depot Manager Kalmanuri bus stand depot contact number (02455) 220049

4 Depot Manager Hingoli bus stand depot contact number (02456) 221784

5 Depot Manager Gangakhed bus stand depot contact number (02453) 222322

6 Depot Manager Pathari bus stand depot contact number (02451) 255346

7 Depot Manager Basmat bus stand depot contact number (02454) 220159

 परभणी जिल्हा पर्यटन:-

    प्रभावती नगरी अर्थात परभणी जिल्हा म्हणजे संत परंपरा, पौराणिक देऊळे आणि गोदावारीच्या तिरावरचा निसर्गरम्य परिसर या अनोख्या भ्रमंतीची परवणीच! शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे. तर संत नामदेव महाराज (नर्सी) आणि संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील! येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ आहे. शेतीविषयी निरनिराळी संशोधने व प्रयोग येथे केले जातात. १८ मे १९७२ रोजी या कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. येथे आकाशवाणी केंद्र आहे. दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र आहे. दूध डेअरी, सूतगिरणी, तेल गिरणी आहे. सय्यद शहा तुराबुल हक्क हा दर्गा असून त्याचा उरूसही येथे मोठ्या उत्साहात भरतो. त्याचबरोबर खंडोबाची यात्राही येथे भरते. येथील पारदेश्वर मंदिर भव्य व प्रेक्षणीय आहे. शुभ्र अशा पाऱ्यापासून निर्मीत शिवलिंग दर्शनासाठी भाविक पारदेश्वराला मोठ्या भक्तिभावाने भेट देतात! महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजनासाठी अगदी प्रातःकालापासूनच भक्त मोठ्या संखेने उपस्थित असतात.

 

परभणी शहराची खाद्यभ्रमंती:-
परभणी- औंढा रोडवर नॅशनल ढाबा आहे तिथे चांगले जेवण मिळेल. औंढ्याच्या जवळ जवळ आहे. परभणीत सकाळी लौकर पोचलात तर वसमत रोडवर शिवशक्ति बिल्डिंगच्या समोर तुलसी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथला डोसा अजिबात चुकवू नका.अर्ध्या ऑफिसर लोंकांचा नाश्ता इथूनच होतो. त्याची गोष्ट सुद्धा आहे , आधी आचारी होता एका हॉटेलात नि आता स्वतःचे हॉटेल . वा !!!! वेळ - सकाळी ७ ते १ दुपारी. परभणी शहरात संध्याकाळच्या वेळी असाल तर स्टेडियम जवळची बॉम्बे भेळ खाऊ शकता.त्याचबरोबर स्टेडियम नाही पण राजगोपालाचारी बागेजवळ चाट खाल्ला.
      परभणीत शाकाहारी चांगले जेवण हवे असेल तर बस स्थानकाजवळ ऐश्वर्या रेस्टॉरंट चांगले आहे. वसमत रोडवर थोडं शहराबाहेर वाटीका. हॉटेलचे बाह्यरंग नि टेबल खुर्च्या पाहून हॉटेलच्या चवीचा अंदाज बाळगू नका .मामूची कॉफी मिस करू नका नि गंगाखेडचे कलम सुद्धा . नि अजून १ मराठी शब्द कळला " डिकासन चहा ".तसेच इथे बऱ्याच बेकऱ्या आहेत चविष्ट पफ खायला.

जिल्‍ह्यातील पाथरी हे शिर्डीचे साईबाबा यांचे जन्‍मस्‍थान आहे. पाथरीचे ऐतिहासिक श्रेष्‍ठत्‍व सिध्‍द करणारा ताम्रपटही प्रसिध्‍द आहे. राक्षसभुवनच्‍या समरप्रसंगी  गोदावरीच्‍या किनारी  निजामाचा पराभव केल्‍यानंतर त्‍याचा समूळ नायनाट करण्‍यासाठी थोरले माधवराव पेशवे हे त्‍याच्‍या मागे लागले होते. त्‍यावेळी त्‍यांनी पाथरीस तळ दिला होता.

             पाथरीपासून 24 कि.मी. अंतरावर गोदावरीच्‍या काठी मुदगल हे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री मुदगलेश्‍वरांचे मंदिर व स्‍वामी ऋषिकेशानंद महाराज यांची समाधी आहे.

                  संत जनाबाई ह्या संत नामदेवाच्‍या परमभक्‍त होत्‍या. संत जनाबाईंचे जन्‍मगाव गंगाखेड असून येथील राजेंद्र पेठेत त्‍यांचा जन्‍म झाला. गंगाखेड येथे संत जनाबाईंचे स्‍मारक बांधण्‍यात आले आहे. अठराव्‍या शतकाच्‍या उत्‍तरार्धात आंनदराज स्‍वामी महाराज यांनी गोदावरी नदीच्‍या दक्षिण किना-यास येथे बालाजी मंदिर बांधले आहे. गंगाखेड पासून 18 कि.मी. अंतरावर राणीसावरगाव येथे रेणुकादेवीचे भव्‍य हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून मूळ पीठाची स्‍थापना भगवान परशुराम यांनी केली असावी, अशी आख्‍यायिका आहे. मुख्‍य  गाभा-यात रेणुकादेवीची सुमारे 4 फूट उंचीची मूर्ती आहे. देवीच्‍या उजव्‍या बाजूस परशुरामाचे स्‍थान आहे. राणीसावरगाव येथे रेणुकादेवीच्‍या मुख्‍य मंदिरात नवरात्रात 10 दिवस व चैत्र पौर्णिमेनंतर 10 दिवस मोठे उत्‍सव साजरे केले जातात. 

            परभणीपासून 12 कि.मी. अंतरावर पूर्वेस श्रीक्षेत्र त्रिधारा वसलेले आहे. 3 नद्यांच्‍या संगमामुळे या क्षेत्रास त्रिधारा क्षेत्र असे म्‍हणतात. नद्यांच्‍या संगमावर ओंकारेश्‍वर, दत्‍तात्रेय, दुर्गाभागवती देवी आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. देवीजवळ एक सुंदर गोमुख बांधण्‍यात आलेले आहे. जवळच नदीकाठी उंबराच्‍या झाडाखाली दत्‍तात्रेयाची मूर्ती स्‍थापन केली आहे. गावात मारुतीचे दक्षिणाभिमुख  एक देऊळ आहे.

            परभणीपासून दक्षिणेस 19 कि.मी. अंतरावर पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर आहे. या मंदिरात डाव्‍या बाजूस तीन फूट ऊंचीची नृसिंहाची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचे आवरण घातलेले आहे तसेच चांदीचे नक्षीकाम केलेली  प्रभावळ आहे. मंदिराच्‍या मूळ गाभा-याचा जीर्णोद्वार करण्‍यात आला आहे. वैशाख शुध्‍द पौर्णिमेला नृसिंहाची यात्रा भरते.

            जिंतूरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले चारठाणा अथवा चारुक्षेत्र हे गाव  ऐतिहासिकदृष्‍ट्या अतिशय महत्‍त्‍वाचे आहे. चारठाणा या संपूर्ण दगडी बांधणीच्‍या यादवकालीन शिल्‍पकलेने नटलेल्‍या गावास हेमाडपंथी स्‍थापत्‍यकलेच्‍या दृष्‍टीने अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. येथील झुलता स्‍तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. हा स्‍तंभ गावाचे वैभव आहे.

जिंतूर या नावाने ओळखले जाणारे गाव हे पूर्वीचे जैनपूर होय. हे गाव एक प्रकारे जैनांच्‍या गत इतिहासाची साक्षच होय. येथील कोरीव गुंफा अतिशय अप्रतिम व प्रेक्षणीय आहेत.  जिंतूरजवळ डोंगरावर नेमगिरी क्षेत्र आहे. येथील डोंगरावर सात गुंफा असून मध्‍यभागी दिगंबर जैन सांप्रदायाचे 22 वे तीर्थंकर श्री भगवान नेमिनाथ यांची अति प्राचीन व भव्‍य मूर्ती जैन मंदिरात पद्मासनात आहे. त्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूस भगवान शांतीनाथ आणि भगवान पार्श्‍वनाथ यांच्‍या सहाफूट उंचीच्‍या प्रतिमा आहेत. बाकी इतर गुंफामधून भगवान आदिनाथ, बाहुबली व नंदीश्‍वरांच्‍या प्रतिमा विराजमान आहेत. दरवर्षी येथे यात्रा भरते  व रथोत्‍सव साजरा केला जातो.

पालम तालुक्‍यात गोदावरीच्‍या पात्रात जांभूळ बेट आहे.  तेथे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे­. बेटावर जांभळाची मोठ्या प्रमाणावर झाडे असल्‍याने त्‍यास जांभूळबेट  असे नाव पडले.

    जिंतूरपासून उत्‍तरेस 15 कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्‍या काठावर येलदरी हे गाव असून तेथे मातीचे मोठे धरण बांधण्‍यात आले आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्‍प उभारण्‍यात आला आहे.

 श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर – Shri Mrityunjay Pardeshwar Mahadev Temple                                                      

     परभणी येथे भारतातील सर्वात मोठे श्रीमृत्‍युंजय पारदेश्‍वर महादेव शिवलिंग मंदीर आहे. हे पारदेश्‍वर मंदिर परमपूज्‍य सद्गुरु महामंडलेश्‍वर श्री सच्‍चिदानंद सरस्‍वती महाराज यांनी  उभे केले आहे. हे शिवलिंग 250 किलो पा-याचे आहे.परभणी शहरात पारदेश्वर या 80 फुट उंचीच्या भव्य मंदिराचे आपण दर्शन घेउ शकतो.

श्री पारदेश्वर मंदीर परभणी

श्री मृत्युंजय पारदेश्वर मंदीर परभणी

श्री पारदेश्वर मंदीर प्रवेशद्वार

पारदेश्वर मंदीर प्रवेशद्वार

श्री पारदेश्वर मंदीर अंतर्गत दृश्य

श्री पारदेश्वर मंदीर मधे

     भारतातील मोठया शिवलिंगांपैकी हे एक शिवलिंग असुन हजारो भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता येतात. या शिवलिंगाला ’तेजोलिंग’ देखील म्हणतात आणि याला 12 ज्योर्तिलिंगा इतकेच महत्वाचे मानले जाते. 

मुद्गलेश्वर महादेव मंदिर – Mudgaleshwar Temple                                                           
   
परभणी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणजे भगवान मुदगलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक मंदिर आहे. गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध महादेवाचे मंदिर उभारले आहे. अहिल्यादेवी होळकरांनी 250 वर्षांपुर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या मंदिराविषयी माहिती घेत असतांना हे मंदिर सुमारे 900 वर्षापुर्वीचे असल्याचे या ठिकाणी असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते. या परिसरात तीन मुख्य मंदिर आहेत. तीन मंदिरांपैकी भगवान नरसिंहाचे मंदीर नदीच्या किनार्‍यावर आहे. गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे भगवान नरसिंह (मुदगलेश्वर) आणि इतर एक म्हणजे भगवान गणेशाचे (मुदगल गणेश) आहे. लोक गोदावरी नदीत स्नान करतात. मुगळेश्वर दर्शनसाठी प्रत्येक महाशिवरात्रीला बरेच भक्त येतात. मंदिरात साजरा केला जाणारा आरती भोवतालच्या आणि सभोवतालच्या परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारी आहे

पावसाळयात तर हे मंदिर काही महिने पाण्याखालीच असते, या ठिकाणी नारायण नागबळी आणि सुखशांती करता पुजाअर्चा देखील केल्या जातात.

मुख्य प्रवेश

मुद्गल पुराणात या ठिकाणचा उल्लेख सापडतो याला देवभुमी देखील म्हंटल्या गेले आहे. या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचा योग्य कालावधी एप्रील ते जुन हा आहे. भगवान शंकरा व्यतिरीक्त नृसिंहाचे आणि श्री गणेशाचे देखील मंदिर या ठिकाणी आहे.

सय्यद शाह तुराबुल हक दर्गा :-

 उरुस किंवा जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर चित्रं उभं राहतं आकर्षक रोषणाई, गगनचुंबी आकाशपाळणे, मौत का कुवाँ या सारख्या मनोरंजक घटकांचं!  हजरत सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) यांचा अनेक वर्षांची परंपरा असणारा  उरुस 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होतो. असंख्य भाविक आत्मिक शांती आणि मनोबल प्राप्तीसाठी सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना श्रध्देनं तुरतपीर बाबा म्हणूनही ओळखतात.  तुरतपीर म्हणजे भक्तांचं दु:ख तात्काळ, तुरंत दूर करणारे पीर! सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) हे सुफी पंथाचे मुस्लीम साधू  समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते. समर्थांच्या जांब या जन्मगावी जात असतांना त्यांचं इथं देहावसान झालं.  सय्यद शाह तुराबुल हक यांनी समर्थ रामदास स्वामींच्यादासबोधया ग्रंथाचं उर्दूत भाषांतर  केलं आहे.  मनाच्या श्लोकांना उर्दूत  मनसमझावनअसं नांव देण्यात आलं आहे. राज्यातूनच नव्हे तर  इतर राज्यातूनही सय्यद शाह तुराबुल हक यांच्या  दर्शनासाठी नियमितपणं येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  उरसाच्या आयोजनात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तिंचा सहभाग असतो.  विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संदलची थाळी डोक्यावर घेऊन उरसाचं प्रतीकात्मक उद्घाटन करतात.  जिल्हा प्रशासनाच्यावतीनं  दरवर्षी उरसानिमित्त 2 फेब्रुवारीस स्थानिक सुट्टीही जाहीर केली जाते.या दग्र्याची लोकप्रीयता एवढी आहे की याला महाराष्ट्रातील अजमेर शरीफ देखील म्हंटल्या जातं.

मशीदचे प्रवेशद्वार

            राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि सर्वधर्म समभाव जपणा-या या उरसात सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचंही आयोजन मोठ्या उत्साहात होतं.    उरसानिमित्त सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्रीपाळणे, टोराटोरा, नावाट्वीस्टर, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, भूतबंगला, मौत का कुव्वा या मनोरंजक बाबींसह विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आलेले असतात. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मीनाबाजारमध्ये  संसारोपयोगी साहित्य, खेळणी आणि सौदर्य प्रसाधनांची रेलचेल असते.

श्रीक्षेत्र त्रिधारा

परभणीहून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेले त्रिधारा हे एक निसर्गरम्य क्षेत्र असून येथील गोदावरी, नर्मदा आणि पूर्णा या तीन नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणास त्रिधारा हे नाव पडले आहे. खडकांमधून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, रंगीबेरंगी वैविध्यपूर्ण पक्षांचा किलबिलाट आणि हिरव्या गर्द झाडीतून दिनकराचा उदयास्त परभणीची सहल अधिक विहंगम करते!

नवागड

त्रिधारेपासून उखळदकडे जातानाचे जैन अतिशयक्षेत्र नवागड तेथील निसर्गरम्य परिसर आणि भव्य, शांत आणि निरामय मंदिरासाठी ओळखले जाते.

श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदीर नवागढ हे भगवान नेमिनाथच्या प्राचीन आणि कलात्मक मूर्तीने प्रसिद्ध आहे.पुर्वी हे ठिकाण उखळद गावात वसलेले होते, जे पूर्णा नदीच्या काठावरुन सुमारे 2 किमी अंतरावर आहे. १९३१ साली नवागढ येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिरासाठी 10 एकर जमीन निजाम सरकारने ताबडतोब दिली.

नवागढचे मंदिर अतिशय कलात्मक, विशाल आणि अतिशय उच्च शिखराचे आहे. या मंदिरातील भगवान देवगिरीची मुख्य देवता पद्मासनात असुन, अत्यंत सुंदर 3.5 फूट उंच काळ्या रंगाची आणि चमत्कारी मुर्ती आहे.मंदिराचा आतील भागा आरश्याने झाकलेला आहे आणि ते अतिशय सुंदर आहे.

नवागढ मंदीर

 नवागढ येथील मंदीर

येथील विद्यार्थ्यांकरिता गुरुकुल शिक्षण व्यवस्था लाभलेली आचार्य आर्यनंदी शिक्षण संस्था सुसंस्कारित शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

गंगाखेड

दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी  सावरगाव हे ठिकाण श्रीरेणुका मातेचे जागृत देवस्थान मानले जाते.  पाथ्री तालुक्यात गोदावरीच्या तीरावर गुंज या ठिकाणी श्री योगानंद महाराज यांनी  स्थापन केलेले देवस्थान आहे. येथे भव्य मंदिर असून श्री योगानंद महाराजांनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली.

गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवाची परमभक्त ही गंगाखेडची समाजातील दमा व करुंड या विठ्ठल भक्त दाम्प्त्याचे नवसाचे अपत्य. तिने नामदेवाविषयीचा आदरभाव, दयावान विठ्ठलाला आहावन, ज्ञानदेवाची पुजा, चोखामेळाविषयी भाव अभंगातून व्यक्त केला आहे.

वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना हे सारे काही संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येते. गंगाखेड येथे संत जनाबाई यांची समाधी आहे.

सेलू

वाल्मिकी ऋषींच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या वालूर अर्थात सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. त्यामुळे या ठिकाणास विशेष महत्त्व लाभले आहे.

पूर्णा

पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वेस्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो. पूर्णा जंक्शनला गाडी थांबली की दाळ वडा आणि सोबत खमंग कढीचा घमघमाट तोंडाला पाणी सोडतो.

पोखर्णी

नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir         

                                                    

परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.

श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे.मंदिरासमोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशद्वार मन मोहून घेते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आणखी एका प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो.  मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.या द्वारामधून एकावेळी एकाच व्यक्तीला खाली बसून प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ १०-१२ व्यक्तीचे दर्शन घेऊ शकतात.

हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.

राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.

    श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची रोद्ररूप धारण केलेली वालुकाष्म पाषाणाची असून सुमारे ४ फुट इंचीची मूर्ती आहे. मुर्ती चतुर्भूज असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असून उर्वरित दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. ही मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे. श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असून त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे. मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.

मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरणे कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असून घंटानाद दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे.याला पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठ्या देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत,ज्यांना देवकोष्ट म्हणतात.

    नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.

नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.

श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जा तसेच धार्मिक पर्यटक ‘ब’ दर्जा मिळालेला आहे.

पाथरी-

पाच पांडवांपैकी पार्थ अर्थात अर्जुनाने वसविलेले पार्थपूर म्हणजेच सद्यस्थित पाथरी. जगविख्यात शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरीच्या तिरावर वसलेले मुद्गलेश्वर हे ऐतिहासिक मंदिर फार रमणीय आहे. पुरातन काळी हे मंदिर 'देवभूमी' म्हणून ओळखले जायचे. मंदिर परिसरात एकूण तीन देऊळ आहेत ज्यापैकी नदीतिरावरील एक मंदिर शिवाचे आहे. नदीपात्रात भगवान नरसिंह (मुद्गलेश्वर) आणि मुद्गल गणेशाचे मंदिर आहे. राज्याची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदा नदीच्या पाण्यात भाविक पवित्र स्नान करून मंदिरांचे दर्शन घेतात. दरवर्षी महाशिवरात्रीला भक्त येथे मोठ्या संख्येने येतात. टाळ आणि मृदुंगाच्या संगीतमय आरतीने परिसर अधिक मनोरम होतो.

 श्री साईबाबा मंदिर पाथरी – Sri Sai Janmasthan Temple, Pathri                                                      

    श्री साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्हयातील पाथरी असुन या ठिकाणी साई बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथे साई बाबांची सिंहासनाधिष्ठीत मोठी मुर्ती असुन त्यांचे जन्मस्थान, त्यांचे मुळ घर, त्यांच्या घरातील भांडी, चमत्कारीक उदी, या सर्व गोष्टी या जागी अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवल्या आहेत.

श्री साईबाबा

 श्री साई स्मारक समितीने मंदिराकरता जागा घेउन तेथे भव्य असे मंदिर बांधले आहे, साधारण 1994 ला मंदिराची निर्मीती सुरू झाली आणि 1999 ला मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आले.

    श्री स्वामी साई शरणानंदाची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असुन त्यांना प्रत्यक्ष साई बाबांचा सहवास लाभला असल्याने त्यांनीच साईबाबांचा जन्म पाथरी या गावातला असल्याचे सांगितले त्यामुळेच ऐवढे पवित्र ठिकाण समजु शकल्याने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी लिहीली आहे.

त्यांच्या शेजारीच श्री बल्बबाबा यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीची माहिती येथे लिहीली असुन त्यांनीच पाथरीला साईबाबांचे भव्य मंदिर तयार होईल अशी भविष्यवाणी केली होती.

जिंतुर

प्राचिन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर. जैनपूर नावाप्रमाणेच जवळच गुहांमध्ये कोरलेल्या जैनशिल्पांमुळे जिंतुर विशेष प्रसिद्धीस आले आहे. नेमगिरी म्हणून ओळखले जाणाऱ्या या क्षेत्री शहरालगतच्या डोंगरात एकूण सहा लेण्या आहेत. त्या प्रामुख्याने अदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शकुट व बाहुबली अशा आहेत. घुमटाची बांधणी चार स्तंभांच्या सहाय्याने केली आहे. हे मंदिर विशेत्वाने ख्यातनाम आहे ते तेथील भगवान पार्श्वनाथांच्या अधांतरी मूर्तिमुळे! जैनांच्या या पवित्र स्थळी भाविक मनोमन विसावतो. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे.

 नेमगिरी

श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान, जिंतुर

हे क्षेत्र जिंतूरपासून 3 किमी अंतरावर परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या सह्याद्री पर्वतांच्या उप-टेकड्यांत वसलेले आहे. नेमागिरि नामक दोन टेकड्या आहेत आणि चंद्रगिरी ही प्राचीन ज्योतिर्लिंग आणि चमत्कारिक जैन गुहा मंदिर व चैत्यलय्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत.

 नेमगिरी च्या टेकड्या

प्राचीन काळी हे क्षेत्र जैनपुर या नावाने प्रसिद्ध होते, हा राष्ट्रकूट कुटुंबातील सम्राट अमोघ वर्षाच्या काळात विकसित झाला. नंतर भारतीय इतिहासाच्या मधल्या काळात, हे आक्रमणकर्ते करून नष्ट केले गेले आणि त्याचे नाव बदलले ते जिंतूर, सध्याचे नाव. त्या वेळी 300 जैन कुटुंबे आणि 14 जैन मंदिर येथे होते. आज त्यातील केवळ दोन मंदिरे पहायला मिळतात.

 नेमगिरी स्मारके

         हे तीर्थक्षेत्र पर्यटकांमध्येही फार लोकप्रिय आहे. राज्यातीलच नाहीतर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून पर्यटक तर येतातच शिवाय परदेशातल्या पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली तर इथं नित्यनेमानं येतच असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

नेमगिरीचे वैशिष्ट्य

या मं‍दिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णत: जमिनीमध्ये दबलेले होते.

१००८ पार्श्वनाथ भगवान

 सुमारे ९००० किलो वजनाची श्री १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्यच आहे.

इतिहास

सैदुल कादरी हा अफगाणिस्तानातून दिल्लीला आला. तो दिल्लीहून अजमेरला ख्वाजा साहबच्या दरबारात पोहचला. दरबारात त्याला असा आदेश देण्यात आला की, जैनपूर (जिंतूर) ला जाऊन तिथं असणाऱ्या मजबूत किल्ल्यामधल्या जैन धर्मियांची संस्कृती नष्ट करुन त्यांच्या मंदिराची नासधूस करून आपला झेंडा फडकावयाचा. आदेशानुसार कादरी अजमेरहून खुलताबाद, दौलताबादमार्गे जैनपूरला आला. तेव्हा जैनपूरमध्ये यमराज आणि नेमीराज नावाचे भाऊ राज्य करत असत. कादरीने गुलबर्ग्याच्या राजा आलमगीरच्या फौजेच्या सहाय्याने हा प्रदेश कब्ज्यात घेतला आणि मंदिर आणि मुर्त्यांचे तोडफोड केली. ही घटना हिजरी सन ६३१ ची आहे.

नंतर १६ व्या शतकामध्ये नांदगांव येथून श्री. वीर संघवी त्यांची पत्नी “घालावी”, मुले नेमा संघवी, सांतु संघवी, अंतु संघवी आणि ३ सुनांसह जिंतूर येथे आले. त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडा-झुडपांनी वेढलेली होती पण मंदिराचे शिखर दिसत होते. तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करायचा संकल्प केला. त्यांनी १६१० साली नेमगिरी आणि चंद्रगिरी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोध्दार केला. याची आठवण म्हणूनच गुफा क्रमांक ४ मध्ये असलेल्या मूलनायक श्री नेमीनाथजी यांच्या प्रतिमेच्या खाली या कुटूंबियांचे शिल्प रेखाटलेले आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य

    गेली २० वर्षे विश्वस्त मंडळामध्ये उपाध्यक्ष असलेले श्री. बबनराव तात्याराव बेंडसुरे यांनी मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हे मंदिर पुर्वी पूर्णपणे डोंगराखाली दबलेले होते. या मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती देताना ते म्हणाले की, गुफा नं.१- पहिल्या गुफामध्ये महावीर स्वामींची साडे तीन फुट उंचीची अत्यंत प्राचीन मुर्ती आहे. या गुफेमध्ये आचार्य भद्रबाहू, आचार्य शांतिसागरजी यांचे पद कमळ हे या गुफेचे वैशिष्ट्य आहे.

     गुफा नं .२- दुसऱ्या गुफामध्ये श्री १००८ आदिनाथ स्वामींची महान प्रतिमा आहे. ध्यान करण्यात मग्न असणारी ही प्रतिमा पाहताक्षणी मनाला मोहिणी घालते. गुफा नं.३- तिसऱ्या गुफामध्ये दर्शन होते ते सकलविघ्नोपशाकमक, परमशांतिदायक, देवाधिदेव श्री. १००८ शांतिनाथ स्वामी यांच्या पद्मासनामध्ये विराजमान मुर्तीचे. सहा फुट उंच या मुर्तीचे दर्शन घेताच भक्तांना दु:खाचा पूर्णपणे विसर पडतो आणि तो ध्यानात मग्न होतो. गुफा नं.४- चौथ्या गुफामध्ये मूलनायक श्री १००८ नेमीनाथ स्वामींची भव्य मूर्ती विराजमान आहे. पाहताक्षणी मन मोहून टकाणारी काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान आहे.गुफा नं.५- पाचव्या गुफामध्ये सर्वांचंच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी श्री १००८ अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामींची पद्मासनातली मूर्ती आहे.

       सुमारे ९००० किलो वजनाची श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्य आहे. या मूर्तिच्या मागे सर्प आहे,त्या सर्पात ओम तयार होते. या मुर्तीचं दर्शन घेताच भक्तांचे दु:ख कमी होतात.

गुफा नं.६- सहाव्या गुफामध्ये साडेचार फुट उंचीची आणि एखाद्या स्तंभासारखी दिसणारी नंदिश्वराची मूर्ती आहे. गुफा नं.७- सातव्या गुफामध्ये भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न अशी ही मूर्ती आहे. मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यावर नागांचे वास्तव्य आणि मांडीमध्ये भुंग्याने केलेले छीद्र यावरून या मूर्तीची तपश्चर्येतील मग्नता दिसून येते.

    नेमगिरीपासून थोड्या अंतरावर चंद्रगिरी नावाचे धार्मिक स्थळ आहे. या चंद्रगिरीचे दर्शन केल्याशिवाय नेमगिरीची यात्रा पूर्ण होत नसल्याची अख्यायिका आहे. चंद्रगिरीकडे जाताना रस्त्यातच युगल चारणऋध्दीधारी मुनिंची पादुका आहेत.

नेमगिरी तीर्थक्षेत्रांचे अन्य उपक्रम

गोशाळा

आचार्य विद्यासागरजी यांचे शिष्य जैनमुनीश्री समाधीसागरजी यांनी गोशाळा असावी अशी सूचना केली आणि सन २००० पासून इथं गोशाळा चालविण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी १५० गायी आहेत.

सोयी-सुविधा

इथं राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयाची आणि भोजनाची देखील उत्तम व्यवस्था आहे.

पोहचण्यासाठी

जवळचे रेल्वेस्टेशन- परभणी अंतर- ४५ कि.मी.

जवळचे बस स्थानक - जिंतूर अंतर - ४ किमी.जिंतूर हे ठिकाण जालना (४० कि.मी.) आणि परभणी (४० कि.मी.) या शहरांशी रोडद्वारे जोडलेले आहे. राज्य रस्ता नागपूर ते औरंगाबाद तसेच राज्य रस्ता नांदेड ते मुंबई (औरंगाबाद मार्गे) या रस्त्यावर जिंतूर आहे.

जवळचे विमानतळ - औरंगाबाद अंतर - १६५ कि.मी.विमानाने

जिंतूर पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून जिंतूर ११० कि.मी अंतरावर आहे.

संपर्क- श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान,

जिंतूर- ४३१ ५०९, जि. परभणी

फोन- ०२४५७- २१९२०८

Email- nemgiri@gmail.com

website- www.nemgiri.org

लेखक - जयश्री श्रीवास्तव

चारठाणा

तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)

चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६ वे ते ९ वे शतक) राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात .

 बसची सोय म्हणाल तर नांदेडला जाणारी प्रत्येक लाल एस टी तिथे फाट्याजवळ थांबते. आत मात्र बस जात नाही. गावात जीप सुमो वगैरे आहेत ते ही सोय करतात.आपण आपली गाडी घेऊन जाणे सगळ्यात उत्तम रस्ते बरे आहेत पण राहण्याची मात्र काही सोय नाही. उत्तम उपाय म्हणजे मंठा किंवा जिंतूरला मुक्काम करून तिथून ये जा करणे बरे. खाण्याचे म्हणाल तर टपरी वजा हॉटेल्स आहेत गावात. बाटली बंद पाणी ही मिळते पण जास्त करून सगळे लोकल ब्रान्ड असतात.ईथे शक्यतो हिवाळ्यात जाणे चांगले. उन्हाळ्यात फार त्रास होतो.

    गावात दीप माळ बघायची आहे , उकंडेश्वर मंदीर बघायचे आहे , पुष्करणी बघायची आहे म्हटले तर कुणीही रस्ता दाखवते.माहिती ही देते.गावातले लोक सौजन्यशीलच आहेत.फारसा गजबजाट नसल्याने शांतपणे मंदीर बघणे फोटो काढणे. करता येते.पायपीट खूप करावी लागते. जुने नवे अशी दोन गावे आहेत. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे. 

     गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता. मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले.पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात फरक जाणवतो. असे एकूटवाण्या स्तंभांची (ओबेलिस्क) परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इजिप्तच्या प्राचीन मंदिरांतही ते दिसतात. असेच स्तंभ महाराष्ट्रात सज्जनगड, पैठण, मस्तानीचे पाबळ ह्या ठिकाणी आहेत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्तम्भावरचे अप्रतिम कोरीव काम

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल

 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवीची मूर्ती

Simple, Free Image and File Hosting at MediaFire


स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा. सध्याची देवीची मुर्ती कदाचित माहुरच्या रेणुकेपासून स्फुर्ती घेउन तयार केली असावी.


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जबरदस्त दृष्टीभ्रम होतो कि नाही! छताला तडे गेलेत त्यामुळे खाली उभे रहायला भीतीच वाटते .


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 मंदिराचे छत

 

मला वाटते या प्रकारच्या छताला गंडस्थळ रचना असे म्हणतात. हत्तीच्या गंडस्थळासारखे दिसतात म्हणून.

ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर ( म्हणून बहुधा जोड महादेव)

सर्वसाधारण पणे पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे. शाळुंखा सर्वसाधारणपणे उजवीकडेच असते. पण काही ठिकाणी त्या शाळुंखा डावीकडेही असतात. पाटेश्वर येथील बहुतेक शाळुंखा ह्या अशाच डाव्या बाजूस आहेत. त्या बहुधा शाक्त पंथीयांच्या असाव्यात.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही

Simple, Free Image and File Hosting at MediaFire


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 एखाद्या बुरुजासारखा हा अवशेष वाटतो आहे. इतके मंदिर वैभव असणार्‍या गावाभोवती काहीतरी संरक्षक तटबंदी असावी असे वाटते ( जशी गोंदेश्वर व एश्वर्येश्वर हि मंदिरे असणार्या सिन्नर शहराभोवती होती). किंवा त्यात देखील एखादे शिल्प दडवलेले असू शकते

 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात

Simple, Free Image and File Hosting at MediaFire


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पुष्कारणीतले कोरीव काम

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो.त्याच्या झुलीवर लहान लहान विष्णूमुर्ती कोरल्या आहेत. चाकण, लोणी भापकर ह्याव्यतिरिक्त रांजणगवाजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरातही एक भग्न यज्ञवराह आहे.असेच यज्ञवराह चाकणच्या किल्ल्याजवळ आहे.  

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 मंदिराचे जोते


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .

 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही.

     गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.

पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)

गावात रहायची काहीही सोय नाही.

पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा ( हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)

लेखनः- आदित्य कोरडे

पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी :-

सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात. हे पुस्तक येत्या २/३ महिन्यात पूर्ण होउन वाचकांना उपलब्ध होइल. डॉ. गो.बं. देगलूरकर सरांचा पहिल्यांदा हे पुस्तक इंग्लिश मधुन व नंतर मराठी मधुन प्रकाशित करण्याचा विचार आहे.

या पुस्तकासाठी मी अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व विदर्भातील काही मंदिरांची प्रकाशचित्रे घेण्यासाठी भटकंती केली. या भटकंतीत मला गावोगावात अनेक प्राचीन मंदिरे दिसली. यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची प्रकाशचित्रे आपल्या समोर मांडावी या हेतुने मी हा प्रयत्न करत आहे. मी मंदिरांची त्रोटक माहिती व जास्त प्रकाशचित्रे जास्त देणार आहे कारण मंदिरांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आपल्याला डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. मात्र वाचकांना विनंती की पुढील मंदिरांची माहिती या मंदिराला मिळणा-या प्रतिसादावर अवलंबुन आहे.

पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .

पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे तर दुस-या एका गर्भग्रुहात आज एका गणपतीची मूर्ती आहे तर तिस-या गर्भग्रुहाची खोली सध्या सामान ठेवण्याची खोली म्हणुन वापरली जाते. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात.

अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.

मंदिराचा दर्शनी भाग

.मंदिराचा दर्शनी भाग

.मंदिर व समोरील पुष्करणी

.मंदिर व समोरील पुष्करणी

.मंदिर व समोरील पुष्करणी

.पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती

.नरसिंहाची भग्न मूर्ती

.मंदिराची उत्तरेकडील बाजू

.मंदिराची दक्षिणेकडील बाजू

मंदिराचा सभामंडप व खांब.

.मंदिराच्या मुख्य गर्भगृहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा

.मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब

लेखन- पराग पुरंदरे

It was not a planned visit to this lovely village filled with history that dates back to 9th century when King Amoghavarsha ruled lands of India. Then a developed city but now a small village, lost its charm and fame to time.

Charthana (चारठाणा) was earlier also known as Charukshetra, charu meaning beautiful, a true description of the place. The city has almost 360 temples in the area but most of them fallen or buried. But the ones that can be seen now definitely makes a statement. And not just temple but other ancient structure also mark their presence and catch attention of visitors to the village.

Even being a remote village of Maharashtra, efforts are being taken by history lovers and Directorate of Archaeology and Museums, Maharashtra to preserve what is left for the future generations.  There are six different sites that are protected under archaeology department and many more are preserved.


jain-mandir
Jain Mandir
jain-murti
Clockwise – Lord Aadinath (Top two), Lord Neminath and Lord Parshwanath (Standing Posture)
jain-vedi
Jain Mandir Vedi
Jain temple in the village was on top in our list. A temple with torn out façade and small entrance was what we could see at first glance. At the centre group of idols can be seen which are worshiped in daily practice and then on the internal periphery some ancient statues can be seen. Some of these statues dates back to 1200 years. Namely statues of Lord Aadinath, Lord Parshwanath and Lord Neminath can be seen along with some other idols. After taking a bow at the temple discussion soon kicked off with locals and they equipped us with the rich history of locality and informed us about leaning or swinging tower near to temple. We moved our parade to the site.


gadhi
Beautiful facade of Old Mansions
On the way we could see multiple palaces and old crafted lanes. Beautifully designed galleries and elegantly decorated arches. Diwali festival was just over and decorations simulated how magnificent sight it would have been in the past.

After negotiating by lanes of the village, we reached Vijay Stambha, a dreadful sight was lying in front of our eyes. Filth was making its presence felt all over the area, shrubs grown in chaotic manner and pigs were taking mud bath …… a very sad and depressing scene, but Vijay stambha was still standing tall amongst all this ordeal. Soon locals joined us and informed that cleaning and restoration of the place is underway and changes will be seen soon, some good thing to hear in all this bad conditions 🙂


vijay-stambh
Vijay Stambha or Jhulata Manora (As called by locals meaning Leaning Tower)
Among the locals was a person namely Mr. Santosh Dukandar, a caretaker or keeper of the village appointed by archaeology department. He is fighting against all odds and against all negativity in the village and protecting remains of monuments in the village. Lack of funds and lack of manpower is big issue here. Even it is difficult for Mr Santosh to make his ends meet sometimes he is doing expenses from his pocket to spray pesticides and insecticides on the pests that grow up in the area.

He informed us that there are 6 prominent archaeological sites namely Jod Mahadev (जोड महादेव), Renuka Devi (रेणुका देवी), Gokuleshwar (गोकुळेश्वर), Ukandeshwar (उकंडेश्वर), Narasi Teerth (नरसी तीर्थ) and Vijay Stambh (विजय स्तंभ) out of which we have been to Vijay Stambha and played a glance at Renuka Mandir on the way to Vijay Stambh. Santosh also informed us that Narasi Teerth is outside village boundaries and Jod Mahadev shares the same temple complex as of Renuka Devi.

He offered us a detailed tour of all the places. The first place on the tour was Ukandeshwar temple which is in the same by lane of Vijay Stambh. This temple is dedicated to lord Shiva and one of the most prominent sculpture here is of “Sapta – Matruka”, 7 different Goddesses are depicted with 7 different vahana, a transportation medium used by Gods.


ukandeshwar
Ukandeshwar
sapta-matruka
Sapta – Matruka
Small path from the Ukandeshwar temple took us to main road and we were again at the junction which lead us to Renuka Devi temple, an old Hemdripanthi (Hemadpanthi as it is commonly called) structure catches eye of a visitor and one cannot miss it once we step in the village. It is said that peak of temple is made from light weight bricks that float on water… amazing isn’t it? All the temples are of the same structure style and can be dated back to 9th or 10th century. Inside Renuka devi temple one can see some amazing carvings of stone and statues. Santosh then guided us to Jod Mahadev temple, the name is so because there are two linga of Shiva in one temple. A gomukh is also seen in one of the inner sanctum of main linga.


renuka-devi
Renuka Devi Temple
jod-mahadev
Entrance of Jod Mahadev Temple
gomukh
“Gomukh” inside Jod Mahadev Temple
We were running short of time and were sad that we could not spend much time at this temple. Adding one more stop to itinerary Santosh advised to visit Golukeshwar temple. A small walk resulted in big surprise, this was the best temple out of all we had seen till now and comparatively maintained best out of the set and the best part was not the cleanliness but was the Pushkarani behind the temple. A huge water body with clean water made our last stop refreshing. This year’s monsoon had abundantly poured water into the Pushkarani.


gokuleshwar
Gokuleshwar
stone-work
Beautiful Stonework on pillars of temple
pushkarni
“Pushkarani”
My phone started to buzz and it was call from home. We had to wind up our “Temple Run”, making promise to myself that many more visits will happen again to this pretty village to unfold its untold history.

Virag

Date: 03-Nov-2016

Place: Charthana

Corodinates: N19.626245, E76.540328

Route: Pune – Aurangabad – Jalana – Mantha – Charthana

Distance: 380km

Travel Mode: Car

 

 

Navagarh

Unknown

Marthwada-Vidharbha Circuit- 8 days, 1750 Kms
Pune-Ahmednagar-Parbhani- Navagarh-Jintur (480 Kms)

Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)

Karnja-Amravati--Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)

Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)

NAVAGARH

Type: Temple-Shri Neminath Digamber Jain Atishaya Kshetra
Near: Parbhani
Base Village: Ukhlad-Pimpari (Deshmukh)
Where: 390 Kms from Pune, 18 Kms from Parbhani
Route: Pune-Ahmednagar-Parbhani-Navagarh
Time visited: October 2011
How to reach: While travelling from Parbhani take Nanded highway (NH222) This is between Nanded and Purna. Look for a Krishna temple arch on the highway on the right side. Its 2-3 kms inside and the road is full of potholes. Mirkhel Railway station is 3Kms away from the temple.
Lodging-Boarding facilities: Available at the kshetra though not in best conditions...
My Meter reading from Pune: 390 Kms

Started from Pune @ 5.30 AM. After a hearty breakfast at smilestone- a popular fastfood joint just few kms before nagar proceed to a bumpy ride on NH222 towards Parbhani. The road is horrible condition. Once we crossed Parbhani  we had tough time finding the temple. We took a wrong advice and a wrong turn led us a 10kms wild round in narrow dusty-bumpymuddy tracks around mirkhel railway station. Finally around 3.30PM we reached the peaceful Navagarh temple.

History: Previously this temple was situated in Ukhlad village at the banks of river Purna. Due to floods the original temple was destroyed but idol of Bhagwan Neminath remained safe. The Nizam government allotted land and new temple was constructed in year 1931 in Navagarh.

Legend: It is said there was a paras stone in the toe of the idol of Bhagwan Neminath. The old priest earned his humble living. Whenever he needed money he used to sell an iron needle which turned into gold, whenever it was touched to Parasmani. At the time of his death he let this secret know to his son and warned him never to be greedy.

The son followed the instructions and earned his living but in course of time he became greedy. He tried to sell iron nails converted in gold by touch of parasmani. Soon the news reached police who were wondering how the priest had golden nails swooped down in the temple. There was explosion and the Parasmani felt in river Poorna and was never found again.

A 2.5 feet high black stoned beautiful idol of Bhagwan Parshvanath in Padmasana posture is installed in the upper portion of the main temple.

There is another ‘Trimurti’ temple in front of this temple.

The 7 feet high idol of Bhagwan Adinath and 5.5 feet high idols of Bhagwan Bharat and Bahubali in standing posture and made of white stone are being installed.

There is a big Assembly Hall in front of the temple and in front of this hall there is 31 feet high, white marbled column of dignity.

Proceeded back to Parbhani and then to Jintur which was 80 Kms away from Parbhani.

 

 

 

 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...