Friday, July 10, 2020

टाहाकारीचे मंदिर ( Tahakari Temple )

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक छोट्या गावात प्राचिन कलाकुसर केलेली मंदिर आहेत. एकेकाळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिर आज आडबाजुला पडली आहेत. प्राचिन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गांवर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गांवरुन प्रवास करणार्‍या व्यापारी तांड्यांची, पांथस्थांची विश्रांतीची राहाण्याची सोय या मंदिरात होत असे. व्यापार्‍यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्पर पूरक रचना होती. इसवी सनाच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.

    सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पूरातन अवंध व पट्टा किल्ल्य़ांच्या परीसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
     या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात येणार्‍या टाहाकारी गावात "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे. मंदिर म्हटल की दंतकथा आलीच. नाशिक परीसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडीत आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याचवेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रा॔ना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परिक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रुपातील पार्वती मातेला ओळखले आणि तीला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धन पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

हेन्री कौसेन्स यांनी १८८० मधे काढलेला मंदिराचा फ़ोटो.

टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिरा जवळ पोहोचल्यावर मंदिरा भोवती असलेली सात फ़ूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पध्दतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकात अडकवले जातात. मंदिराचे मुळचे तीन कळस कोसळलेले असुन त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढभ कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधुन मंदिराची शोभा घालवायाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशिब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजुनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.



    
  टाहाकारीच हेमाडपंथी मंदिर भूमीज पध्दतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चारफ़ूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला "अधिष्ठान" म्हणतात) उभ आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मुर्ती दिसतात. त्यातील एक शंकर पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराच छत ७२ खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तूळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तूळाकार कोरीवकामात फ़ुल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजुस तीन गर्भगृह आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.




     मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भूजा असलेली काष्ठमुर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुर मर्दीनीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजुस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.


     मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारीका, नृत्य करणारी, वादन करणारी,शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मुर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरु केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मुर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहा मागिल देवकोष्टात चामुंडेची मुर्ती आहे. चामुंडा हे देवीच क्रुर रुप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचु, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मुर्ती आपल लक्ष वेधुन घेते. या देवकोष्टका खाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमी प्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेल आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.


     मुख्य गर्भगृहा मागिल देवकोष्टात नृत्य करणार्‍या शंकराची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी ताल वाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपर्‍यात बासरी वाजवणार गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रम्हा, विष्णु, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागिल देवकोष्टात डमरु, तलवार आणि त्रिशुळ घेतलेल्या शंकराची मुर्ती कोरण्यात आलेली आहे. मुर्तीचा एक हात तुटलेला आहे.


     मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिरा समोर येउन नदीवरील घाटाच्या पायर्‍यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही.  खांबाच्या बाजुला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिरा बाहेर काही वैशिष्ट्यपूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फुट उंचीचे हे दगड अष्टकोनी असुन त्याच्या वर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.


     मंदिर परीसरात भक्तांसाठी बांधलेला नविन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परीसरातील झाडी, जवळून वाहाणारी नदी यामुळे हा परीसर रम्य झालेला आहे. या रम्य परीसराला आणि उन, वारा, पाउस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतक उभ असलेल हे मंदिराच दगडी शिल्प पाहाण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.



     मुंबईकर ,नाशिककर स्वत:च वाहान असल्यास एका दिवसात "टाहाकारीच जगदंबा मंदिर","टाकेदच जटायु मंदिर" पाहु शकतात. जर वेळेच व्यवस्थित नियोजन केल तर शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला "पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड" ही पाहाता येइल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.
जाण्यासाठी:- १) मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.

२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्‍या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...