Thursday, July 30, 2020

पुसदचा वीरगळ

कीर्तीमुख
विद्यार्थीदशेत  clinical methods चं पुस्तक वाचायचो. रूग्णाला तपासताना त्याच्या शरीरावर दिसणारी लक्षणं कशी कशी बघायची याचं वर्णन तिथं असतं.त्या वर्णनातलं एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचं कोरल्या गेलंय ते म्हणजे Eyes only see, what mind knows.अर्थात रूग्ण तपासताना डाॅक्टरच्या मनात असलेल्या वैद्यकिय निदानाच्या संभावनाच त्याला रूग्णामध्ये प्रथमदर्शनी आढळू शकतात.कित्ती खरं आहे ना हे? अगदी आपल्या दैनंदिन जीवनात पण हे बऱ्याच अंशी लागू पडतं.पण कधी कधी या नियमाला अपवाद पण होतात एखाद्या प्रवासात.आपल्याला माहिती नसलेली अगदी ऐकलेली पण नसलेली एखादी गोष्ट आपण बघतो व कुतूहल जागृत होऊन त्याविषयीच्या माहितीचा शोध घेऊ लागतो आणि मग आपल्याला जी माहिती भेटते ती आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या व जाणींवाच्या कक्षा विस्तारत नेते, नाही?
असाच एकदा ओंकारेश्वरला जाण्याचा योग आला.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे ओंकारेश्वर. पुण्यसलिला नर्मदेच्या काठावर वसलेलं ओंकारेश्वर मध्यप्रदेशात येतं.मी माझ्या अन्य तीन मित्रांसह तिथे गेलो होतो.तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की तिथं नर्मदेच्या उत्तर तीरावर एक ओंकारेश्वराचं व दक्षिण तीरावर एक ममलेश्वराचं अशी दोन शिवालयं आहेत.आम्ही दक्षिण काठावर होतो त्यामुळे उत्तर तीरावरील मंदिराला जाण्यासाठी बोटीने जावं लागेल हे स्पष्टच होतं. जिथे गाडी पार्किंग होतं तिथंच एका व्यक्तिने एका बोटवाल्या मुलाला आवाज देऊन बोलावलं व त्याला आम्हाला उत्तर तीरावर जायचंय हे सांगितलं.आम्ही चौघे-पाचजण असूत.थोडंफार बोटीच्या
भाड्याविषयी घासघीस झाली असेल/नसेल व आम्ही त्याच्या बोटीने जायचं नक्की केलं.अठरा-एकोणवीस वर्षांचा सुदृढ तरूण पोरगा होता आमचा नावाडी. घाटाच्या पायऱ्या उतरून खाली आलो व त्याच्या बोटीत बसलो.ती मोटारबोट होती.नर्मदा मला कायमच भुरळ पाडते.आद्य शंकराचार्यांनी लिहीलेल्या नर्मदाष्टकाची,नर्मदा नदी बघुन मला आठवण येते.नदी काठचा उंचच उंच दगडी किनारा व त्या दगडांचे स्पष्टपणे दिसून येणारे स्तर बघण्यात मी चांगलाच गुंगलो होतो.आमची बोट नदीपात्राच्या मध्यभागी आली.पाण्याचा हिरवट काळसर रंग तिथं नदीपात्राची खोली खुप जास्त असावी हे स्पष्ट जाणवून देत होता.मी सहज माझ्या नावाड्याला नदी पात्राची खोली किती आहे
हे विचारलं. तर तो पोरगा मला म्हटला की ‘मैय्या यहां पाचंसौ फिट गहरी बहती है’.नर्मदातटीच्या या लोकांचं भावविश्व नदीभोवती इतकं छान गुंफलंय की ती लोक नदीला आईच समजतात.मला त्याचं नर्मदेला मैय्या म्हणणं खुपच भावलं.परंतू नदी पाचशे फुट खोल असेल याबद्दल त्याचं मत नदीचं तुलनात्मक अरूंद पात्र बघता फारसं पटत नव्हतं.पण मग नदीपात्राची खोली सांगणारा अन्य कोणताही माहितीस्त्रोत तिथं नव्हता.त्या नावाड्याचा जन्मापासून सगळा जीवनकाळ नर्मदेवरच गेला आहे त्यामुळे  त्याने सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवायला काही हरकत नव्हती.आणि तसंही मी तिथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आलो होतो,नदीपात्राची
लांबी,रूंदी,खोली माहिती करून घ्यायला नाही, त्यामुळे मी तो विषय तिथंच थांबवुन नावाड्याला त्याचं नाव वय शिक्षण इ विचारलं.त्याचं वय अठरा-एकोणवीस वर्ष काय जे त्याने सांगितलं ,शाळा आठवी नववीत सोडून दिलीये व आडनाव केवट आहे हे त्यानी सांगितलं.’हम केवट है’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान डवरून आला होता.’पुराणो मे लिखा है, नर्मदा किनारे केवट सब से श्रेष्ठ होते है’ तो मला सांगायला लागला.मला हे ऐकून भारीच आनंद झाला.नर्मदेच्या दोन्ही तटांवर वेगवेगळ्या जनजाती व जमाती रहातात.नर्मदा परिक्रमा केल्यास सांस्कृतीक मानववंशशास्त्रा (cultural anthropology)  बद्दल बरीच माहिती भेटू शकते.कालांतरानी मी ओंकारेश्वराच्या पश्चिमेस नर्मदा किनारी फारतर पन्नास किलोमिटरवर असलेल्या रावेरखेडीला पहिल्या रावबाजी पेशव्यांची समाधी बघायला गेलो होतो.समाधी बघुन झाल्यावर तिथे सहज  नर्मदेत एका डोंगीत बसून फेरफटका मारला होता.त्या डोंगीच्या नावाड्याचं आडनाव वर्मा होतं व ती वर्मा लोक तिथं परंपरागत नावाडी व मच्छीमारीचं काम करतात हे पण नव्यानेच कळलं होतं. असो. जसाजसा घाट जवळ आला,आमच्या नावाड्याने दुरूनच आम्हाला मांधाता राजाचा राजवाडा दाखवला.नर्मदेच्या ऐन तीरावर नदीपात्राला लागुनच दाटीवाटीने बांधलेली घरं व नर्मदेच्या पुराच्या पाण्याचा उपद्रव होऊ नये म्हणुन त्यांच्या बांधलेल्या उंचच उंच मजबूत भिंती मला खुपच नाविन्यपूर्ण वाटल्या.घरांच्या त्या दाटीतंच तो नावाडी एका घराकडे बोट दाखवून ,वहां वो मेरा घर है,देखो असं म्हणाला.मला नक्की कोणतं त्याचं घर होतं हे शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. लहानपणी रांगणं शिकण्यापूर्वी नर्मदेत पोहणं शिकलो असं ही तो सांगत होता . गप्पांच्या नादात लवकरच आम्ही घाटावर पोहोचलो व बोटीतुन उतरून घाटाच्या पायऱ्या चढून ओंकरेश्वराच्या मंदिरात गेलो.थोडावेळ रांगेत उभं राहून शिवलिंगाचं दर्शन घेतलं,मी तिथं लिंगाष्टक स्तोत्र म्हटलं होतं.बाहेर आलो व पाच एक मिनीटं थांबुन घाट उतरून खाली आलो.बोटीत बसून परत दक्षिण तीरावर आलो.तिथं त्या नावाड्याने आम्हाला जिथं उतरवलं त्याठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्याच्या अलिकडेच एका गोमुखातून पाण्याचा एक मोठा झरा खळाळत नदीकडे वाहत होता.मी त्या झऱ्यात हात धुतले व तहान लागलीच होती तर तेच पाणी प्यायलो.खुपच छान वाटलं ते झऱ्याचं ताजं पाणी पिऊन,मला. घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो व ममलेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीचं दर्शन घेतलं. या मंदिरात तुलनेने गर्दी काहीच नव्हती.रूद्राष्टक म्हणून मी बाहेर पडलो व मंदिर परिसरात फिरायला लागलो.मुख्य मंदिरासमोरच एक दोन लहान लहान मंदिरं होती.एका मंदिराच्या दारासमोर एक चेहऱ्याचं शिल्प ठेवलं होतं तर बाजूला प्रांगणात  दोन तीन छोटे छोटे चौकोनी शिल्पं ठेवले होते.शिल्पाच्या चारही बाजूला ढाल तलवार घेतलेला योद्धा,शिवलिंगाची पुजा करणारी स्त्री,मंचावर झोपलेली व्यक्ती व आकाशातुन येणारी एक व्यक्ती व चंद्रसूर्य कोरलेले होते.मी कुतुहलापोटी यासर्वांचे फोटो काढलेत.मंदिराच्या भिंतीवर तांडवनृत्य करणाऱ्या शंकराचं शिल्प बघुन तर मला रावणानी लिहीलेलं शिवताण्डव स्तोत्रच आठवलं होतं.शंकरपार्वतीचं पण शिल्प होतं बहुतेक.या सगळ्यांचे मी फोटो काढलेत व आम्ही परत फिरलो.
घरी आल्यावर मी देगलुरकर सरांना त्या फोटो संदर्भात काॅल केला होता व त्या शिल्पांचे फोटो सरांना पाठवून दिले होते. देवळाच्या दारात ठेवलेलं चेहऱ्याचं शिल्प हे कीर्तीमुखाचं आहे तर चौकोनी शिल्प हे वीरगळ आहे,सरांनी मला सांगितलं. ‘वीरगळ’ हे प्राचिन काळी युद्धामध्ये वीरगतीला गेलेल्या एखाद्या योद्ध्याच्या स्मरणार्थ घडवल्या जायचे व मांडल्या जायचे.त्याकाळचे ते ‘अमर जवान ज्योती’ सारखे स्मारकच समजायला काही हरकत नसावी. अगदी सोमनाथला पण सरदार पटेलांनी  सोमनाथाच्या मंदिराचं पुनर्निर्माण केलं तिथे पण मंदिरापासुन थोडं दूर समोर मंदिराच्या रक्षणार्थ धारातिर्थी पडलेल्या सर्व ज्ञातअज्ञात वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक छोटंसं स्मारकशिल्प बनवलंय.वीरगळाचं शिल्प वेगवेगळ्या धाटणीचं असू शकतं पण त्यावर सहसा ढाल तलवार घेतलेल्या योद्ध्याचं चित्र असतंच.सरांनी मला त्या चौकोनी शिल्पाच्या प्रत्येक शिल्पचित्राचा अर्थ सांगितला होता.चंद्रसूर्याचा अर्थ आकाशात चंद्रसूर्य असे पर्यंत त्या वीर योद्ध्याच्या हौतात्म्याची कीर्ती दिगंत राहिल, हे एकीकडे सर मला सांगत होते आणि जिथं ते शिल्प ठेवलं होतं तिथं ते कोणाच्या स्मृतीत ठेवलंय हे तर सोडाच पण ते एक वीरस्मारक आहे हे पण कोणाला फारसं माहिती नव्हतं याचा मी विचार करत होतो.
असंच एकदा माझ्या बहिणीकडे अलिबागला गेलो होतो.रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोहोचलो,अंग सगळं घामाने व प्रवासाने आंबलेलं होतं.गेल्याबरोबर मस्त पंधरावीस मिनीटं आंघोळ केली व जेवण केलं.जेवणानंतर माझी बहिण मला फिरायला घेऊन निघाली.तिचे शेजारी आहेत धुमाळ काका.अगदी घरोब्याच्या संबंधातले.त्यांचं मूळगाव आहे नारंगी.ती मला नारंगीला त्यांच्या घरी व तिथुन बाजुच्या मंदिरात नेणार होती. अलिबागपासुन ईशान्येला  पेणला जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळभाट ओलांडला की एक मोठा डोंगर लागतो.डोंगरातला घाट जिथे संपतो तिथे कार्लेखिंडीतून एक रस्ता उत्तरेकडे वळतो व मुख्य रस्ता पुढे वडखळ पेण कडे जातो.या उत्तरेकडे वळलेल्या फाट्यावर आत वळणावळणाच्या रस्त्यानी पंधरा वीस किलोमिटरवर नारंगी गाव आहे. रस्ता पूर्ण दुतर्फा झाडीने आच्छादलेला व रस्त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची कमीजास्त उंचीची भिंत.नुकताच श्रावण लागला होता.आम्ही निघालो तेव्हा दुपार झालेली होती व सूर्य ढगा आडून अधुनमधुन डोकावत होता. कोकणातलं मोठं प्रसन्न वातावरण होतं ते.भगिनी निवेदिता मला ठिकठिकाणी थांबवुन मोठमोठाली झाडं किंवा एखाद्या तळ्यात फुललेली water lily किंवा कमळाची फुलं  दाखवत होती.तिला निसर्गाची भारीच आवड, अर्थातच मलादेखील! मला तर कळत्या वयात जेव्हा पहिल्यांदा  सह्याद्री बघितला,तत्क्षणीच त्याने माझ्या मनावर गारूड केलंय, ते या जन्मी उतरणार नाही हे नक्की. रमतगमत आम्ही धुमाळ काकांच्या घरी गेलो.काका घरी नव्हते काकू होत्या.अगदीच खास कोकणी पद्धतीचं गाव व घर होतं काकांचं.माझी बहिण काकूंसोबत बोलत बसली व मी त्यांच्या परसबागेत गेलो.वेगवेगळी झाडं बघुन मी चांगलाच रमलो होतो त्यांच्या परसबागेत.त्यांनी पाळलेला ससा त्याच्या पिंजऱ्यात आरामशीर पहुडला होता. त्याला बघण्यात माझा वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही .गप्पा आटोपल्यावर आम्ही सरबत घेऊन गावाशेजारच्या मंदिराकडे निघालो.गावापासून दोनएक किलोमिटर दूर डोंगराच्या चढावावर ते मंदिर होतं.मंदिराच्या जवळच एक जलकुंड होतं,जलकुंड कसलं छोटा तलावच होता तो तर पश्चिमेला सह्याद्रीची भलीमोठी उंच डोंगररांग होती. मंदिराजवळच कोणीतरी नुकताच कचरा जाळला होता त्याचा धूर सर्वत्र पसरला होता,अगदी मंदिरात सुद्धा.आम्ही आत गेलो,दर्शन घेतलं व बाहेर येऊन प्रदक्षिणा घातली. गाभाऱ्यातील एका कोनाड्यात एक छोटी मूर्ती होती.मी तिचा फोटो घेतला.मंदिराच्या बाहेर बाजुला एक शिल्प होतं.एक व्यक्ती खांद्यावर एक काठी घेऊन जाताना कोरलेला होता.मी त्या शिल्पाचा फोटो घेतला होता.ते शिल्प वीरगळ असावं असा माझा अंदाज होता.पण शिल्पाच्या हातात ढाल तलवार नसून एक काठी आहे हे बघुन मला तशी खात्री नव्हती.आमच्या इतिहासाशी संबंधित व्हाॅट्सअॅप ग्रुपवर त्या शिल्पाचा फोटो टाकल्यावर प्रा.रवी बावीस्कर सरांनी ते शिल्प वीरगळच आहे हे निश्चीत करून दिलं.त्या शिल्पाच्या हातातली काठी म्हणजे भाला असावा असंही त्यांनी सांगितलं.कोनाड्यातल्या मूर्तीचा फोटो बघुन ती मूर्ती भैरवाची आहे हे देगलुरकर सरांनी सांगितलं होतं.
आता मला वीरगळाची थोडीफार माहिती झाली होती.पुढे पुसदला एका अंत्यसंस्कारासाठी जाणं झालं होतं.तिसऱ्या दिवशी सावडण्यासाठी गेलो होतो.जाताना मित्राच्या गाडीवर गेलो पण येताना सगळेजण निघुन गेलेत.मी एकटाच राहिलो होतो हे बघुन एक नातेवाइक माझ्यासाठी थांबले. आम्ही रस्त्याने पैदल परत निघालो.स्मशानातून गांधी पुतळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर आम्ही चालत होतो.  त्या रस्त्यावरून करूणेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला वळलो आणि त्या वळणावर अगदी रस्त्याला लागुनच एक छोटंसं लाल रंगात रंगवलेलं मंदिर मला दिसलं.हा भाग गावाच्या  जुन्या   मध्यवर्ती भर वस्तीतला भाग आहे.या मंदिराच्या बाहेरच अगदी रस्त्याला लागुनच एक शिल्प ठेवलेलं आहे ते मला दिसलं.
शिल्पात एक व्यक्ती एका हातात तलवार व एका हातात ढाल घेऊन दाखवला आहे. हे शिल्प बघता क्षणीच मला ते वीरगळ आहे हे जाणवलं.मला फोटो घेण्याची इच्छा होती परंतू प्रसंगाचं औचित्य ओळखुन मी तो मोह आवरला होता. माझ्या डोक्यात त्या शिल्पाविषयीचे विचार सतत घोळत असायचे.कोण असेल बरं तो वीर योद्धा ज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शिल्प तिथं मांडलं असेल? कुठल्या समरांगणी त्याला वीरमरण आलं असेल? ते युद्ध कधी झालं असेल? कोणाच्या बाजुने तो लढला असेल व कोणाविरूद्ध? याची कसलीही माहिती मला नाही.मला फक्त एवढं माहिती की औरंगजेबाच्या काळात पुसदची जबाबदारी राजस्थानातल्या कोण्या राजपूत सरदाराकडे होती. त्याच्या सैन्यातला सैनिक असेल हा की कोणी स्थानिक मराठी सैनिक? स्थानिकच असण्याची शक्यता जास्त कारण शिल्प पुसदला आहे.बरं याविषयी अधिक माहिती देऊ शकेल असं कोणी पुसदमध्ये माझ्या ओळखीचंही नाही. या माझ्यासाठी तरी अज्ञात वीराचं हे शिल्पं वाहत्या रस्त्याच्या अगदी कडेला उन्हापावसाचा मारा सहन करत बरंचसं उपेक्षित असं पडलंय खरी.बघितलं त्या क्षणापासुन हे शिल्पं माझ्या मनात घर करून होतं. मी सर्वप्रथम ओंकारेश्वरला एक शिल्प बघितलं,तेव्हा मला वीरगळाविषयी काहीही माहिती नव्हती.सहज औत्स्युक्यापोटी मी फोटो काढले व देगलुरकर सरांना दाखवले होते.त्यांनी दिलेल्या माहिती मुळेच माझ्या मनाला वीरगळ या शिल्पसंकल्पनेची जाणीव झाली होती.त्या माहितीच्या आधारेच मी नारंगीच्या वीरगळाविषयी कयास बांधू शकलो ,जो रवी सरांनी निश्चीत करून दिला होता.तर पुढे पुसदचा वीरगळ मला अगदीच अचानक व फारच वेगळ्या परिस्थितीत बघितल्या बरोबर ओळखू आला. Eyes only see,what mind knows चा पुनःप्रत्यय मी घेतला होता हे नक्की.
(वीरगळा विषयीची ही पोस्ट लिहीताना मी माझ्या जवळील सर्व भ्रमंतीतील शिल्पांचे फोटो असलेलं फोल्डर शोधत होतो.ते पूर्ण फोल्डरच माझ्या मोबाइल व लॅपटाॅपमधूनही गहाळ झाल्याचं मला लक्षात आलं.सुदैवाने माझा बारावीतला वर्गमित्र आशिष खेडकर याच्याजवळ ओंकारेश्वराच्या वीरगळाचे फोटो व्हाॅट्सअॅपला सापडलेत.त्यानी ते मला परत पाठवलेत.कीर्तीमुखाचा फोटो मला सापडला नाही.तर पुसदच्या वीरगळाचा फोटो माझा मित्र प्रशांत भट यानी काढून पाठवलाय. आशिष व प्रशांत दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.)

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...