Saturday, August 29, 2020

भिवंडी, शहापूर परिसराचा फेरफटका

आजच्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे मँचेस्टर मानले जाणाऱ्या भिवंडी व शहापूर भागात. 
...........
तानसा, भातसा, वैतरणा आणि मोडक सागर ही या भागातील चार धरणे मिळून मुंबईची तहान भागवत असतात. भिवंडी व शहापूरच्या आसपासचा भाग हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेला आहे आणि निसर्गरम्यही आहे. या भागातून मुंबईला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जात असल्याने राज्य शासनाने या भागाला नो केमिकल झोन म्हणून घोषित केले आहे. तानसा नदी, उल्हास नदी आणि काळू नद्यांमुळे येथील निसर्गसौंदर्य वाढले आहे. 
वज्रेश्वरी देवी


भिवंडी निजामपूर महापालिका :
सन २००२मध्ये ही महानगरपालिका अस्तित्वात आली. भिवंडी हे यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भिवंडीत १९२७मध्ये खानसाहेब समदशेठ यांनी पहिला यंत्रमाग सुरूकेला. ‘सोने विका आणि यंत्रमाग घ्या’ अशी त्यांची घोषणा होती. आजमितीला पाच लाख माग येथे आहेत. सध्या या उद्योगावर मंदीची लाट आहे. पूर्वीच्या काळी कामोरी नदीतून वसई खाडीमार्गे भिवंडी ते गुजरात, तसेच दक्षिण भारतातही व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि हातमाग कापड या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ने-आण या ठिकाणी होत असे. म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे २५० वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत. भिवंडी गावात यापैकी काही कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. आजही भिवंडीत भाताच्या काही गिरण्या शिल्लक आहेत. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा १८ खोल्यांचा जोगळेकर वाडा त्यापैकीच एक. याच्या भिंती दोन फूट जाडीच्या आहेत आणि तो चौपाखी कौलारू आहे. अनेक जुन्या वाड्यांची जागा आता अपार्टमेंटनी घेतली आहे. 

वारलादेवी तलाववारलादेवी तलाव
वारलादेवी तलाव : हा विस्तीर्ण तलाव म्हणजे भिवंडीकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. येथे उद्याने, जॉगिंग ट्रॅक आहेत. सायंकाळी येथील वातावरण खूपच छान असते. तलावाच्या पूर्वेस ‘इस्कॉन’ मंदिर आहे. कलवार भागात कालिकामाता मंदिर आहे. हे मंदिर पर्यटन केंद्र व्हावे अशी भिवंडीकरांची मागणी आहे. भिवंडी शहरात मुस्लिम वस्तीही पूर्वापार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मशिदीही आहेत. 

लोनाड  बौद्ध लेणीलोनाड बौद्ध लेणी
लोनाड बौद्ध लेणी : ‘एक अपूर्ण राहिलेले अजिंठा’ असे इतिहासकार लोनाडचे वर्णन करतात. सन १८७५मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने ही लेणी शोधली. कल्याणजवळील ही बौद्ध लेणी गेली १५०० वर्षे निसर्गाशी लढा देत महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत उभी आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पाच ते सातव्या शतकात कोकणचे मौर्य राजे यांच्या काळात कोरण्यात आली आहेत. एका टेकडीच्या मध्यभागी एक चैत्य गुंफा आहे. शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना असलेली ही गुंफा असून, शिल्पपट्ट्यात जातककथा कोरलेल्या दिसून येतात. बाहेर चार खांब असलेला वऱ्हांडा आणि आतील बाजूस मोठे सभागृह आहे. गुहेच्या एका बाजूला पाण्याचे टाके आहे. उन्हाळ्यातही येथे पाणी असते. लेण्यातील काही मूर्तीवर शेंदूर फासला असल्याने शिल्पाची ओळख पटत नाही. गुहेमध्ये दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात खांडेश्वरी देवीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. या मूर्ती नंतर बसविल्या असाव्यात. प्राचीन काळी लोनाड हे बौद्धधर्मीयांचे केंद्र होते. बौद्ध भिक्खू त्या काळात या गुहेमध्ये आराम करत. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणी जरूर भेट द्यावी. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाट्यावरूनच लोनाडला जाता येते. 
 
 लोनाड ची लेणी (Lonad Caves) - खंडेश्वरी देवी
लोनाड ची लेणी (Lonad Caves) 

ही बौद्ध लेणी कल्याणच्या जवळ आहेत. सध्या ह्या लेण्यांच खंडेश्वरी देवी मंदिरात रुपांतर झालेलं आहे. अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पुजाअर्चा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो. साधारण ५ व्या शतकातली ही लेणी असावी असं इतिहास सांगतो

साधी लेणी आणि शांत वातावरण हे लेण्यांना भेट दिली की लगेचच जाणवतो. संपूर्ण प्रवास उन्हात केल्यावर मंदिराच्या गुहेत नैसर्गिक एयर कंडीशनर मध्ये गेल्यावर फारच सुंदर आणि मस्त वाटलं. बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल  आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे आणि त्याचे काही अवशेष आवरून ठेवलेले दिसतात. 

डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे आणि अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही तिथे पाणी दिसतं. पाणी वापरात नसल्याने मासे बेडूक ही आहेत आत पण पाणी दिसायालात तरी शुद्ध दिसतं. 

पाण्याच्या टाकी समोर म्हणजे मंदिराच्या उजवीकडे. दगडात कोरलेली शिल्प आहेत त्यांना मारुतीला फसतात तसा शेंदूर फसलेला आहे. आत ही बऱ्याच मूर्त्या आणि शिल्प अशीच शेंदुराने सजवलेली दिसतात. हे शिल्प तसं बघायला गेलं तर उत्तम परिस्थितीत आहे. ह्या शिल्पा बद्दल माहिती उपलब्ध झाली पण दोन वेगळ्या माहित्या पदरात पडल्या म्हणजे 

एक अशी की दुसरा खुश्रु याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी माहिती अशी की हा प्रसंग बौद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्ती नंतर येवून पूर्वजन्माची माहिती देतांना चा प्रसंग आहे. शिल्पामध्ये राजा, दरबार, सेवक, कलाकार दिसतात.

प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात.

गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं. 

मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत. 

मंदिराच्या गाभाऱ्यात आम्हाला एक रंगीबेरंगी बेडूक ही दिसला. Hylarana nigrovittata जातीचा हा बेडूक होता. लेण्याबाहेर वेडा रघु, दयाळ वगैरे पक्षी ही दिसले.


लोनाडचे शिवमंदिर : लेण्यांपासून काही अंतरावर हे शिवमंदिर आहे. ठाणे परिसरात सन ५००च्या सुमारास बौद्ध संस्कृती अस्तित्वात होती, तर सन १२००च्या दरम्यान शिलाहार राजे सत्तेवर होते. त्यांच्या काळात उभारलेल्या मंदिरापैकी हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. साधारण त्याचा सुमारास अंबरनाथचे शिवमंदिरही उभे राहिले. हे मंदिर अंबरनाथच्या मंदिराअगोदर ५० वर्षे बांधले असावे. अपरादित्य राजाचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याचा ताम्रपट सापडला आहे. शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या मंदिराला देवाच्या पूजेसाठी ‘दक्षिणायन दान’ म्हणून भादाणे गाव इनाम दिले, अशा आशयाचा मजकूर त्यावर आहे. रामेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची मोठ्या प्रमाणावर वाताहत झालेली आहे. मंदिरातील गाभारा व शिवलिंग चांगल्या स्थितीत आहे; मात्र खांब मोडकळीस आलेले आहेत. मंदिरातील खांबांवर आणि भिंतीवर नक्षीकाम आणि विविध देव-देवतांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. 
 
 लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - Lonad Shiv Temple

लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर)  बघून पुढच्या मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर. 

हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात.  आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले. काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली आनंदात खेळत होती

आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे 

गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.


मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं.  त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.

मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं

मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे.  मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम


लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - गुगल नकाश्यावर 


बापगाव शिलालेख : लोनाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर चौधरपाडा गाव आहे. येथील बाबू वाकडे यांच्या शेतात कित्येक वर्षांपूर्वी एक शिलालेख आढळून आला. उल्हास नदीवरील गांधारी पूल ओलांडल्यानंतर कल्याण-आधारवाडी-सापे रस्त्यावर बापगाव नावाचे गाव आहे. येथे केशिदेव दुसरा याच्या चौधरपाड्यातील शके ११६१मधील (सन १२३९) शिलालेखात बापगाव किंवा बोपेग्रामचा पहिला उल्लेख वाचायला मिळतो. सन १८८२मध्ये पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी हा शिलालेख उजेडात आणून त्याचे वाचन केले. लेखाची भाषा संस्कृत आणि नागरी आहे. त्यावर शक संवत ११६१ विकारी संवत्सर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री म्हणजे ग्रेगॅरियन कॅलेंडरप्रमाणे २४ जानेवारी १२४०, श्रीकेशीदेव दुसरा (अपरार्कराज याचा पुत्र) याचे सोमेश्वर (रामेश्वर) मंदिर. अशी मंदिरासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती तेथे आहे. ही शिळा एक फूट जाड, एक फूट पाच इंच रुंद व सहा फूट उंच असून, शिलालेखात वरच्या बाजूला मध्यभागी मंगलकलश व त्याच्या दोन बाजूला चंद्र-सूर्य असे चित्र कोरले असून, त्याखाली देवनागिरी संस्कृतमध्ये २२ ओळी आहेत व सर्वांत खाली मिथुनशिल्प कोरले आहे. या शिलालेखातील वरच्या काही ओळींत शिलाहार राजांची वंशावळ आहे. उघड्यावर पडून राहिलेला शिलालेख गावकऱ्यांनी गावातील शिवमंदिरात जतन करून ठेवला आहे. 

टिटवाळा महागणपतीटिटवाळा महागणपती
टिटवाळा : हे ठिकाण येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिरामुळे प्रसिद्ध झाले. हे मंदिर चिमाजीअप्पांनी वसईत पोर्तुगीजांवर विजय मिळविल्यानंतर बांधले. माधवराव पेशवे यांची श्री गणेशावर नितांत श्रद्धा होती. पेशवाईत राज्यकारभार करताना अधूनमधून विश्रांतीसाठी ते टिटवाळा या रम्य ठिकाणी येत असत. या देवळाचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिर बांधल्यावर माधवराव पेशव्यांनी श्रींची पूजा, तसेच मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जोशी कुटुंबीयांना वहिवाटदार म्हणून नेमल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत इंग्लंडच्या महाराणीने १८५९मध्ये नव्याने सनदा करून दिल्या. त्या आजदेखील जोशी कुटुंबीयांनी जतन करून ठेवल्या आहेत. टिटवाळा येथे विठ्ठल मंदिरही आहे. 

टिटवाळा तलावटिटवाळा तलाव
गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. स्थानिक प्रचलित कथेप्रमाणे येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस ‘विवाहविनायक’ असे म्हटले जाते. दुर्वास मुनींच्या शापामुळे दुष्यंत राजाला पत्नी शकुंतलेचा विसर पडला. त्याच्या विरहाने शकुंतला व्याकुळ झाली होती. त्या वेळी कण्व मुनींनी याच मूर्तीची स्थापना करून उपासना करण्यास शकुंतलेला सांगितले होते. 

चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरव्ही येथे फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. आपण थेट गाभाऱ्यात पोहचतो. मंदिर परिसरात गेल्यावर मनाला शांती मिळते. शेंदरी रंगाची गणेशमूर्ती खूपच आकर्षक आहे. टिटवाळा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने धर्मार्थ हॉस्पिटलही चालविले जाते. तसेच दुष्काळग्रस्तांना मदतही केली जाते. ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक उपक्रम चालविले जातात. मंदिर परिसर खूप छान असून, एक छोटा तलावही येथे आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले, की मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. विशेष म्हणजे येथील रस्त्यावर अजूनही टांगे धावतात.
 
श्रीगंगा गोरजेश्वरश्रीगंगा गोरजेश्वर


श्रीगंगा गोरजेश्वर :
शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळ्यापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी काळू नदीपात्रात हे एक पुरातन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात होडीने जावे लागते. हे मंदिर ५०० वर्षे जुने असावे, असे बोलले जाते. त्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंती शैलीतले. मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. मंदिर परिसरातील विविध देव-देवतांच्या मूर्ती, शिल्प आणि घोटीव शिलालेख या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. मंदिराच्या वरच्या बाजूला नदीपात्रात असणाऱ्या मोठ-मोठ्या दगडांवर अवाढव्य अशी सात भोके कोरलेली दिसून येतात. या मंदिरामागे गरम पाण्याची पाच कुंडे आहेत. येथे पर्यटन विभागाने लक्ष देऊन मंदिर परिसरातील गाळ काढावा, तसेच रस्त्याची सुविधा करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. आसपासच्या गावातून भाविक, तसेच अभ्यासू पर्यटक येथे येत असतात. 

वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडेवज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडे


वज्रेश्वरी :
पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील देवतेच्या सन्मानार्थ या शहराचे नाव वज्रेश्वरी करण्यात आले. हे मंदिर थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजीअप्पांनी नव्याने बांधले. वज्रेश्वरीला वज्रबाई आणि वज्रयोगिनी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवर देवी पार्वती किंवा आदिमायेचा अवतार मानले जाते. तिच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘वज्राची बाई (गडगडाट)’ असा आहे. हे गाव गरम पाण्याच्या कुंडांमुळे प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेप्रमाणे, श्रीराम आणि श्री परशुराम यांची येथे भेट झाली असे म्हणतात. पौराणिक कथेत म्हटले आहे, की परशुरामांनी वडवली येथे यज्ञ (अग्नी अर्पण) केला. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे. 

वज्रेश्वरी मंदिरवज्रेश्वरी मंदिर


या मंदिराच्या आजूबाजूला पाच ते १० किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याची २० ते २२ कुंडे आहेत. सन १७३९मध्ये चिमाजीअप्पांनी वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी वडवली भागात तळ ठोकला होता. तीन वर्षे ही मोहीम चालू होती. चिमाजीअप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रार्थना केली होती, की वसई मोहीम फत्ते झाली तर आपण देवीसाठी मंदिर बांधू. स्थानिक दंतकथेनुसार, चिमाजीअप्पांना वज्रेश्वरी देवी स्वप्नात दिसली आणि किल्ला कसा जिंकता येईल हे तिने सांगितले. त्याप्रमाणे वसईत पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि वज्रेश्वरी देवीला बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजीअप्पांनी मंदिर बांधून घेतले. 

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार वसईच्या किल्ल्याप्रमाणे बांधले असून, त्यावरील नगारखाना बडोद्याचे राजे गायकवाड यांनी बांधला आहे. मंदिराला तटबंदी आहे. मंदिरासमोरील दीपमाळा नाशिक येथील सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या २२ पायऱ्यांपैकी एका पायरीवर सुवर्णकासवही कोरलेले आहे. मुख्य मंदिराचे तीन विभाग आहेत. मुख्य गर्भागृह (गाभारा), आणखी एक गर्भागृह आणि सभामंडप. गाभाऱ्यात एकूण सहा मूर्ती आहेत. उजव्या व डाव्या हातात तलवार आणि गदा असलेली वज्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. बाजूला रेणुकादेवी व महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. देवीच्या मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी आणि मुकुटांनी सुशोभित केल्या आहेत, तसेच चांदीच्या कमळांवर उभ्या आहेत आणि चांदीच्या छत्र्या त्यांच्या मस्तकावर आहेत. बाहेरील गर्भागृहात गणेश, भैरव, हनुमान आणि मोराबा देवीसारख्या स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. 

अकलोली : तानसा नदीच्या काठावर असलेली येथील गरम पाण्याची कुंडे प्रसिद्ध आहेत. येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व आहे. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे. सुट्टीच्या दिवसांत या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात. हे ठिकाण वज्रेश्वरीजवळ आहे. 

गणेशपुरीगणेशपुरी
गणेशपुरी : वज्रेश्वरीच्या उत्तर-पूर्व बाजूस गणेशपुरी येथेही गरम पाण्याची कुंडे आहेत. पौराणिक कथेप्रमाणे वसिष्ठ ऋषींनी येथे गणपतीची आराधना केली होती. म्हणूनच गणेशपुरी असे नाव गावाला देण्यात आले आहे. स्वामी नित्यानंद यांचे शिष्य बाबा मुक्तानंद यांनी स्थापित केलेले गुरुदेव सिद्ध पीठ येथे असून, परदेशातूनही त्यांचे अनुयायी येथे येत असतात. स्वामी मुक्तानंदांनी आपल्या गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री गुरुदेव आश्रम असे नाव दिले. स्वामी नित्यानंद यांची समाधी, भीमेश्वर गणेश मंदिरे आश्रमाच्या अगदी जवळ आहेत. वारली या आदिवासी जमातीसाठी येथे एक आश्रम चालविला जातो. 

शहापूर : महाराष्ट्र शासनाने शहापूरला पर्यटनाचे केंद्र म्हणून घोषित केले. शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. हा तालुका ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा आहे. शहापूर हे निसर्गाच्या कुशीत विसावलेले आहे. शहापूर पश्चिमेकडील घाटाने (सह्याद्री) वेढलेले आहे. माहुली किल्ला आणि आजोबा पर्वत यांसारखी येथील ठिकाणे ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहेत. स्थानिक मंदिरांमध्ये मानस मंदिर आणि गुरुद्वारा यांचा समावेश आहे. 

मानस मंदिर, आसनगावमानस मंदिर, आसनगाव


मानस मंदिर, आसनगाव :
शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळ अत्यंत सुंदर जैन मंदिर आहे. माहुली किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य ठिकाणी ही सुंदर वस्तू जैन समाजाने निर्माण केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर हे ठिकाण आहे.
मानस मंदिर, आसनगावमानस मंदिर, आसनगाव


आटगांव शिवमंदिरआटगांव शिवमंदिर
आटगाव : या मंदिराची फारशी ऐतिहासिक माहिती नाही. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्यामधील शिवलिंग काळाच्या ओघात नष्ट झाले असावे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील गणपतीचे शिल्प हे ते मंदिर शिवाचे असल्याचे द्योतक आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटलीकर, शैलेश पाटील व सात्त्विक पेणकर यांच्या लेखनामुळे अशी अपरिचित गावांची इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांना माहिती होते आहे. या गावातील प्राचीन मंदिर पूर्ण भग्नावस्थेत आहे; पण अस्तित्वात असलेले जोते, नक्षीकाम केलेले आडवे पडलेले अखंड खांब आणि गाभाऱ्यावरून मंदिराचे स्वरूप डोळ्यापुढे येते. येथील विखुरलेल्या अवशेषांवरून व येथे दिसून येणारे वीरगळ यांमुळे हे मंदिर बहुधा शिलाहार काळात अंबरनाथ मंदिराच्या वेळीच बांधले गेले असावे, असा कयास आहे. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मंदिराबद्दल माहिती आहे. 

आटगाव शिवमंदिरातील वीरगळ (आटगाव फोटो सौजन्य : थिंक महाराष्ट्र)आटगाव शिवमंदिरातील वीरगळ (आटगाव फोटो सौजन्य : थिंक महाराष्ट्र)
अभेद्य माहुलीगड : या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली याबद्दल माहिती उपलब्ध नाही. शहापूर तालुक्यातील त्रैकुटक उर्फ माहुलीगड हा गिरिभ्रमण, दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी तरुणांचा अत्यंत आवडता गड मानला जातो. याची समुद्रसपाटीपासून उंची २८५० फूट आहे, हा गड घनदाट अरण्याने व्यापलेला असून, नवरा, नवरी, भटजी नावाचे त्याचे आकाशाला भिडणारे सुळके दुरूनच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणाला पौराणिक, तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेतील हे महत्त्वाचे ठिकाण आहे. 

माहुलीगड अतिशय प्राचीन आहे. ११व्या शतकात माहुली पर्वताचा उल्लेख गोरक्षनाथांनी आपल्या किमयागार ग्रंथात रामायणातील ‘किष्किंधाकांड’ अध्यायातील अजय पर्वत, त्रैकुटक उर्फ माहुली असा केला आहे. देवगिरीचे यादव व शिलाहार यांच्यातील लढाईनंतर शिलाहारांचे अस्तित्व संपुष्टात आले. त्यानंतर ठाणे प्रदेशावर नागरशाचा काही काळ अंमळ होता. महिकावतीच्या बखरींप्रमाणे या वेळी देवगिरीच्या यादवांनी त्यांचा प्रधान हेमाड पंडित याला ठाणे जिंकण्यासाठी पाठविले. परंतु नागरशाचा पराक्रमी पुत्र त्रिपुरकुमार याने हेमाड पंडिताचा पराभव केला. त्या वेळी त्रिपुरकुमारने हेमाड पंडिताला माहुली गडापर्यंत मागे हटविले. हेमाड पंडिताने माहुलीगडावर आश्रय घेतला होता. तेथे त्याची कोंडी झाली. हेमाड पंडित देवगिरीस परत गेला. 

त्यानंतर देवगिरीच्या रामदेवराव यादवांनी शांतपणे रणनीती आखली होती; पण त्याच वेळी अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला व लूट करून निघून गेला. त्यानंतर रामदेव यादव याचा मुलगा राजा बिंबदेवाने ठाण्यावर आक्रमण केले व ठाणे परिसराचा ताबा घेऊन नागरशाचे राज्य संपविले. त्यानंतर इ. स. १४८५मध्ये हा परिसर निजामशहाकडे गेला. त्यानंतर बहामनी काळात शहाजीराजे निजामशाहीमध्ये दाखल झाले, त्या वेळी दिल्लीच्या मुघल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाहीवर हल्ले करू लागल्या. १६३५-३६च्या सुमारास शहाजीराजांनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर-शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला व या जागेला बालशिवाजींचा पदस्पर्श झाला.
 
माहुली किल्लामाहुली किल्ला


त्या वेळी महाबतखानचा मुलगा खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंना किल्ला सोडावा लागला. पुढे जानेवारी १६५८मध्ये रोजी शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत घेतला; पण १६६१मध्ये तो मुघलांना परत द्यावा लागला. लगेचच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकूट परत करावे लागले. त्यानंतर मुघलांचा सरदार मनोहरदास गौड याने गडावर बरेच बांधकाम करून गड बळकट केला. फेब्रुवारी १६७०मध्ये खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर हल्ला केला; पण तो अयशस्वी झाला. नंतर १६ जून १६७० रोजी मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला व मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे तीनही किल्ले जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. 

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत; मात्र किल्ल्यावरून भातसा, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. पूर्वेला हरिश्चंद्रगड, दक्षिण-पूर्वेला माथेरान रांग, दक्षिण-पश्चिमेला तानसा खोरे व कोणत्याही दिशेला नजर जाईल तिथपर्यंत सह्याद्रीची गिरिशिखरे पाहायला मिळतात. मोडक सागर, भातसा या तलावांचे विहंगम दृश्य दिसते. आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने जावे लागते. किल्ल्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. पहारेकऱ्यांच्या देवड्या, वाड्याचे काही अवशेष, ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष दिसत नाहीत. माहुलीगडावर घनदाट जंगल आहे. मोर, ससे, रानडुक्कर, साळिंदर, सांबर, हरीण आणि बिबटे अशा वन्य प्राण्यांची येथे वस्ती आहे. मुख्य म्हणजे येथील जंगलसंपदा विविधतेने नटलेली आहे. साग, ऐन, खैर, पळस, पांगारा, सावर या वृक्षांच्या बरोबरीने कडुनिंब, निर्गुंडी, अडुळसा, रिठा अशा अनेक प्रकारच्या वनौषधी आढळतात. येथील आदिवासी गडावरील रिठ्याची फळे गोळा करून विकतात. गाइडशिवाय या किल्ल्यावर जाऊ नये. 

कसे जाल भिवंडी परिसरात? 
भिवंडी हे दिवा-वसईरोड मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे; मात्र कल्याण हे मोठे जंक्शन असल्याने उत्तर-दक्षिण-पूर्व बाजूने येणाऱ्या गाड्यांसाठी सोयीचे आहे. भिवंडीतून दोन महामार्ग नाशिककडे जातात. एक जव्हार मार्ग व दुसरा कसारा-इगतपुरी मार्ग. भिवंडी रस्तेमार्गाने पुणे-मुंबईशी जोडलेले आहे. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी येथे चांगली हॉटेल्स उपलब्ध. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून पर्यटनासाठी योग्य. 

(या भागातील काही माहितीसाठी ‘थिंक महाराष्ट्र’चे सात्त्विक पेणकर यांचे सहकार्य लाभले.

 History Of Shahapur District Thane Maharashtra

History of Shahapur Thane, Places to Visit in Shahapur, Shahapur Town, Shahapur Taluka, Maharashtra.

History of Shahapur Thane, Places to Visit in Shahapur, Shahapur Town, Shahapur Taluka, Maharashtra.

ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९ चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून  जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.

१ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरात The Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येवून वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता.


शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटीश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव  हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते. आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर आहे. ब्रिटीश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे.

शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली  किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.

शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी  "कोळवण" तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील "मिलिटरी डीपार्टमेंट  डायरी" क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स . १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवण चे रुपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते.

शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन  जास्त असून "भाताचे कोठार"  म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू  नाही. नो केमिकल झोन मुळे  औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत.
तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी  येथे उल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास  मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धारण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे. 

 Mahuli Fort Shahapur Thane Maharashtra

Mahuli Fort, Mahuli Fort Trek, Mahuli Fort History, Mahuli Fort History in Marathi, Mahuli Fort Map, Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.

Mahuli Fort Trek Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.

भौगालिकदृष्ट्या  शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्वाच्या ठिकाणाशी जोडलेला गेला होता. कल्याण सुभ्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्व होते. तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता. माहुली वरून जव्हार मार्गे सुरत तर माहुली वरून नाशिक आणि माहुली वरून किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अश्या भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्व प्राप्त झाले होते. ठाणे, कल्याण, भिवंडी, जव्हार, नाशिक, सुरत, मुरबाड अश्या महत्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले होते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडका पासून बनलेला हा किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड, आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे.त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अश्या दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे.

Mahuli Fort Address, Mahuli Trek, Mumbai to Mahuli fort Distance, Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.

किल्ल्याचे वर्णन आणि पोहोचण्याबाबत माहिती.
माहुलीगाव ते किल्लाच्या पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात आपल्याला एकूण ४ मंदिरे लागतात. हि मंदिरे सुद्धा ऐतिहासिक आहेत. प्रथम मारुतीचे मंदिर लागते. या मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात. १९८२-८३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नांदी असून नंदी ज्या पायावर तो पाय पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभारयातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात मत पार्वतीचे शिल्प आहे. या माहुली मंदिरात माहुलीचा संक्षिप्त इतिहास व माहुलीची रचना दुर्गप्रेमी मंडळाने चित्रित केली आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या बाजूने उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे जातो. पावसाळ्या व्यतिरिक्त या नदीत फारसे पाणी नसते. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. यातील मुख्य मूर्ती हि वज्रेश्वरीच्या मूर्तीसारखी आहे असे पुजारी सांगतात. या दोनही मंदिराच्या आसपास काही प्राचीन शिल्प सुद्धा विखुरलेली आहेत. देवीच्या मंदिरामागे एका पिंपळ वृक्षाखाली गाडी चौथऱ्यावर शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. माहुलेश्वर मंदिराच्या मागून एक पायवाट जाते.या पायवाटेने पुढे गेल्यास दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून त्याचा जीर्णीधार १९७८-७९ ला झाला आहे. 

Mahuli Fort, Mahuli Fort Trek, Mahuli Fort History, Mahuli Fort History in Marathi, Mahuli Fort Map, Mahuli Fort Address, Mahuli Trek, Mumbai to Mahuli fort Distance, Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.
मंदिराच्या समोर एक दगडी घुमट, दगडी अर्धवट फुटलेला पाटा, युद्धप्रसंगांचे चित्रण असलेले अर्धवट फुटलेले विरगळ आहे. या चारही मंदिरातील मूर्ती किती जुन्या आहेत हे सांगता येणे तसे अशक्य आहे. पण त्य शिवकालीन वा पेशवेकालीन म्हणजेच मध्ययुगीन तर नक्कीच आहेत. पेशावेकाळात यातील काही मंदिरांची स्थापना झाली असे मानले जाते. किल्ल्याचा इतिहास आणि पायथ्याचा परिसर एकदा लक्षत आल्यानंतर प्रत्यक्षात किल्ला चढणे व किल्ल्याची पाहणी करणे सोपे जाते. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे. मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे  म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो. एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत.  वास्तविक हि किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे. ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते.

या पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका वा डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. येथे आपण माहुलीच्या कड्याला येतो. कडा चढून जाण्यासाठी सुमारे ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी हि शिडी मोकळी होती. आता मात्र ती मजबूत केली आहे. संपूर्ण किल्ला चढताना हे एकाच ठिकाण अवघड आहे. ते मात्र जपून जावे लागते. शिडी चढून वर आल्यानंतर जवळ जवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. हा पायवाटेचा  मार्ग मुळच्या महादरवाज्याच्या वाटेपासून किमान पाचशे फुटापेक्षाहि दूर आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडा झुडूपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे, तेथून महादरवाजाकडे जाता येते. तेथे एक पाण्याचे टाके व देवड्या म्हणजे पहारेकरयाची जागा आहे. दुसरे एक पाण्याचे टाके शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसून येते. पायथ्याशी शिवमंदिरासमोर विहीर आणि दोन टाकी या व्यतिरिक्त पाण्याची सोय अन्यत्र नाही. महादरवाज्या वरून उजवीकडे न जाता सरळ वरच्या अंगाकडे गेल्यानंतर एक भिंत आणि कलाकुसरीची काही शिल्प आढळतात. तेथे उर्दू लिपीतील शिलालेख असून त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. या जागेला नमाजगिर असे म्हणतात. नमाजगिराच्या उजवीकडे गेल्यानंतर एका वाड्याचे अवशेष आढळतात. एकेकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचे आज भग्नावशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरच्या पठाराच्या मध्यभागी एक तळे असून  त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. पळसगडावरून तानासातलावाचे विहिंगमय दृश्य दिसते. पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते. पळसगड का म्हंटले जाते हे सांगता येत नाही. मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच गिर्यारोहक छोटा माहुली असेही म्हणतात

Mahuli Fort Trek Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.

माहुलीच्या डाव्या बाजूस म्हणजेच काहीसा दक्षिणेस भंडारगड आहे. भंडारगड नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे गडावरील या ठिकाणी भांडार असावे. या गडाच्या दक्षिणेस चार सुळके असून त्याला स्थानिक लोकांनी भटजी, नवरा, नवरी, करंगळी अशी नवे दिलेली आहेत. माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना दोन शिल्पे असून त्यांचे चेहरे डूक्करांसारखे आहेत. म्हणून त्याला डूक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात. पायथ्याजवळील मंदिराच्या परिसरात पडलेल्या विरगळ प्रमाणे येथे सुद्धा एक विरगळ आहे. मध्यभागी काही ज्योतीसुद्धा आहे. त्याच्यापुढे एक तळे व काराविमध्ये हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा आहे. भंडारगडावर दहा खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे. 

कल्याण सुभ्याकडून येणारा रस्ता म्हणून त्याला कल्याण दरवाजा असे नाव मिळाले असावे. या दरवाजातील आतल्या बाजूस मराठीत एक शिलालेख असून त्याची भाषा दुर्बोध आहे. माहुली किल्ला व भंडारगड  यांच्यामध्ये एक आडवी तिडवी पसरलेली खिंड असून  भंडारगडावर पोहोचण्यासाठी खिंड उतरून एक डोंगर चढावा लागतो. पळसगडावरील कल्याण दरवाजातून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आहे. एका घळीत एक झिजलेला व अर्थबोध न होणारा लेख व काही कोरीव पायरया आहेत. तर दरवाज्याजवळ एक टाके असून त्याला माठ टाक म्हणतात. तेथून पुन्हा माहुलीकडे जाताना उजव्या बाजूस एका डोंगराच्या माथ्यावर कड्यापाशी एका दरवाजाचे अवशेष आढळतात. याला हनुमान दरवाजा म्हणतात. तेथून पुढे हनुमान व गणपतीची कोरीव शिल्पे आहेत. तेथून खाली पायथ्याशी येणे किव्हा माहुलीच्या मध्यभागी जावून त्या रस्त्याने पायथ्याशी येता येते, परंतु ह्या वाटेने स्थानिक लोकच ये जा करू शकतात कारण वाट अवघड आहे. भंडार गडाच्या दक्षिणेस असलेल्या चार सूळक्यांचा व खिंडीच्या अलीकडे एक डोंगर असून त्यास माहुली-चंदेरी या नावाने ओळखले जाते पण हे नाव मुळचे नाही. माहुली किल्ल्यावरील भारंगी नदी तेथे उगम पावते. हि नदी पायथ्याला वेढाघालून पुढे जाते तेथून ती शहापूर येवून शेवटी भातसा नदीलाजावून मिळते.

असे एकंदरीत माहुली किल्ल्याचे स्वरूप असून दोन शिलालेख, कल्याण, हनुमान व महादरवाजा, चिरेबंदी वाड्याचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, माहुलेश्वर, मंदिर, तळे, बुरुज, देवड्या, विरगळ घोड्याची मान, भटजी, नवरा, नवरी, व करंगळी हे सुळके, तीन जोती, डूक्करतोंडी शिल्प, हनुमान व गणेशाची शिल्पे, तानसा तलाव पोंईन्ट, भारंगी नदीचा उगम, सूर्योदय व सूर्यास्त, खिन्डी, दरी, बांबू व केवड्याची बने, पावसाळ्यातील धबधबे व दुथडी भरून वाहणारी भारंगी नदी, किल्लाच्या पायथ्याशी असणारी चार मंदिरे, माथेरान पेक्षाही उंच व थंड हवा, हिरवीगार वनश्री यामुळे माहुली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. वानरे, ससे, माकडे, डुकरे, हरीण, हे प्राणी व मोर, घार, गिधाड, यासारखे पक्षी तर फुरश्यासारखे विषारी साप असे येथील वन्य जीवन समृद्ध आहे.

सावरोली रस्त्यावरील सरकारी गोदामाजवळ एक वाघोबाचे मंदिर आहे. माहुलीच्या जंगलातील वाघाचा आपणास उपद्रव होवू नये म्हणून हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. यावरून माहुलीच्या वन्यजीवानाची कल्पना येते. माहुलीवरील सुळके, माहुली किल्ला, व भंडारगड यामधील खिंड, वाटेवरली शिडी, हनुमान दरवाजा व कल्याण दरवाजा वरून खाली उतरण्याची वाट याठिकाणी दक्षता घ्यावी लागते. सकाळी लवकर जावून संध्याकाळी परतणे शक्य आहे. किल्ल्यावर राहायची व्यवस्था नाही. स्थानिक लोकांना विचारून रस्त्याची माहिती करून घ्यावी. माहुली किल्ला हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. किल्ल्यावरील व पायथ्यावरील ऐतिहासिक अवशेष हा आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा असून पर्यटकांनी, गिर्यारोहकांनी आणि अभ्यासुनी त्याचे योग्य ते जतन करावे.

पोहोचण्याबाबत माहिती

 
माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशन वर उतरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते. शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत  जाण्यासाठी रिक्षा, बस असतात. बस अनिश्चित आहेत. किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात विश्रांती घेवून किल्ला चढणे हा एक उत्तम पर्याय आहे. सुमारे दीड ते दोन तासाच्या चढणीत वाटेत कोठेही पाणी नसल्याने पाणी जवळ असावे.  किल्लाच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्लाच्या पायथ्याशी आहेत. पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटीश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता. 

https://shahapurdarshan.blogspot.com/p/mahuli-fort-shahapur-thane-maharashtra.html


 माहुली धबधबा / Mahuli Waterfall Shahapur Near Thane

 

पावसाळा सुरु झाला कि नकळत पावले वळतात ती निसर्गाच्या सानिध्यात. मनमुराद आनन्द लुटण्यासाठी. त्यामुळे पावसात कधी धबधब्याच्या ठिकाणी तर कधी ट्रेकींगसाठी डोंगर दरयात फिरून वीकेंड मौज मस्तीत घालावण्यासाठी तरुणाई जोषात पर्यटनस्थळी निघते.

शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा सध्या तरुणाई साठी आकर्षण ठरला असून येते तरुणाई सह पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र येथे पर्यटकांनी निसर्गाच्या प्रेमात आणि वेडात आपले भान न हरवता निसर्गाचा मनमुराद आनन्द घ्यावा असे आवाहन इथल्या ग्रामस्थांनी केले आहे.

पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी असे हे ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे शहापूर पासून ७ कि. मी. अंतरावर असलेला माहुली किल्ला. ह्याच्या पायथ्याशी असलेले हे धो धो कोसळणारे धबधबे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे त्यांचे मनोहारी रूप, पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ पाडते. एकूण ३ धबधबे रांगेत पर्यटकांची प्रतीक्षा करत आहेत असा जणू भासच होत असतो.



धबधब्या पर्यंत जाण्यासाठी माहुली निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पायवाट बनवलेली आहे. वळण वाटा असलेला रस्ता, चालताना झोंबणारा गार वारा, संपूर्ण हिरवीगार झाडी, डोंगरावर उगवलेले गवत ह्यामुळे पर्यटकांना येते जणू स्वर्गाचा भासच होतो.
धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर उंचावरून धो धो पडणारे पाणी पाहताना, भिजल्या शिवाय रहावतच नाही. धबधब्याच्या जवळ जाताच पाण्याचे तुषार आपल्याला आकर्षित करतात. फक्त हि वाट जरा अवघड असल्याने चढताना आणि उतरताना पायाखालचा दगड सरकणार नाही ना, याची काळजी घ्यावी. तिसरा धबधबा शंभर फुट पेक्षा जास्त उंचीवरून धो धो कोसळतो, त्यमुळे त्याच्या खाली आपला टिकाव लागण कठीण आहे, म्हणून जास्त जवळ न जाता लांबूनच आनंद घ्यावा.

 श्री क्षेत्र गंगास्थान / Ancient Temple Shahapur

शहापुरातील वाफे येथे असलेले गंगास्थान व गंगास्थान जवळील त्र्यम्बकेश्वराचे मंदिर पुरातन मानले जाते. हे स्थान शहापूरच्या पूर्वेस अवघ्या १कि. मी. अंतरावर आहे. या स्थळास एक पवित्र परंपरा आहे. प्रत्येक जुन्या मंदिरामागे वा धर्मस्थानामागे एखादी कथा असते. सुमारे ७०० वर्षापूर्वी या ठिकाणी असलेल्या औदुंबराच्या छायेखाली एक साधुपुरुष ध्यान करत असे. हा साधुपुरुष दर एकादशी व पौर्णिमेला नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी जात असे. साधू महाराज र्यंबकेश्वराहून नित्यपुजनासाठी गंगाजल आणत. कालांतराने त्यांना वार्धक्यामुळे शहापूरहून त्र्यंबकेश्वरला जाणे अवघड होवू लागले. नियमात खंड पडत असल्याने व गंगाभेत होत नसल्याने ते व्यथित झाले. त्यांनी औदुंबराच्या व्रुक्षाखाली आराधना सुरु केली. त्यावेळी साक्षात गोदावरीने दृष्टांत देवून भेटीला येते असे सांगितले आणि ज्या औदुंबराच्या व्रुक्षाखाली ते आराधना करत असत, तेथे ती नदी प्रकट झाली, हि नदी म्हणजे गोदावरी नदी असे मानले जाते. त्यामुळे पुढे हे स्थळ गंगास्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. प्रकट झालेल्या नदीसाठी कुंड बांधण्यात आले. 

 त्र्यंबकेश्वराची गोदावरी गंगारुपाने या ठिकाणी अवतरली म्हणून या ठिकाणी शंकराची प्रतिस्थापना करून त्र्यंबकेश्वराचे मंदिर बांधले. ज्या साधुमहाराजांमुळे गोदावरी नदी येथे प्रकट झाली ते साधुमहाराज औदुंबरवृक्षाखाली समाधिस्थ झाले. सातारा येते वास्तव्यास असलेल्या जोशी आडनावाच्या व्यक्तीस साधू महाराजांनी दृष्टांत दिला. जोशी गंगास्थळी आले, त्यांनी साधूमहाराजांच्या समाधीस्थानाची सेवा सुरु केली, काहीवर्षांनी ते सुद्धा समाधिस्थ झाले.  त्यांची समाधी संतोषीमाता मंदिराजवळ आहे. मराठेशाहीच्या काळात पुन्हा एकदा गंगास्थान प्रकाशात आले. किल्ले माहुली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा मुक्काम गंगास्थानी होता. किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ महाराजांनी त्र्यंबकेश्वराजवळ दुसरे शिवमंदिर उभारले त्याला काशी विश्वेश्वर असे म्हणतात. मुस्लिम आक्रमणापासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून दोन्ही मंदिरांवर कळस बांधलेला नाही. याजावालाच समर्थ रामदासांनी स्थापन केलेले हनुमान मंदिर आहे. काशी विश्वेश्वरासमोर असलेली दीपमाळ १९४०च्या महापुरात वाहून गेली. त्यामुळे भाविकांनी दुसरी दीपमाळ उभारली.  या स्थानाच्या मान्गल्यामुळे या स्थानी सद्गुरु साईनाथ महाराज, शेगावचे संत श्री गजानन महाराज, अक्कलकोट येथी स्वामी समर्थ या ठिकाणी वास्तव्यास आले होते. त्यामुळे ह्या स्थानाचे पावित्र्य अधिकच वाढले आहे. 

गंगास्थानातील हे गंगाजल मधुमेह व रक्तदाब या विकारांवर परिणामकारक असल्याचे मानण्यात आले. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. शहापूर पंचक्रोशीतील एक जेष्ठ तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी गंगापुजनाचा विधी येथे केला जातो. आसनगाव रेल्वे स्थानकापासून २ कि. मी., शहापूर गावापासून 
१ कि. मी. व मुंबई- नाशिक महामार्गापासून १/२ कि.मी. अंतरावर असलेले हे सुमारे ७०० वर्षापूर्वीचे ठिकाण तीर्थस्थान म्हणून जेष्ठ व पवित्र आहे. 

 श्री लक्ष्मी-नारायण मंदिर / Laxmi Narayan Temple Shahapur Thane




शहापुरातील श्री लक्ष्मी-नारायण मंदिर हे जुने मंदिर आहे. वैश्य समाजाची वस्ती स्थिरावल्यानंतर वैश्य समाजाने मंदिर उभारण्याचे ठरवले. सुरुवातीला लक्ष्मी-नारायणाऐवजी विठ्ठल-रखुमाईची स्थापना करण्याचे ठरवले होते, परंतु मुर्तीकाराकडे लक्ष्मी-नारायणाची मूर्ती उपलब्ध असल्याने त्यांची प्रतिस्थापना करण्यात आली. हे मंदिरही इतर मंदिराप्रमाणेच आहे. गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती असून सभा मंडपात डाव्या हाताला चौथारयावरील चौकटीत विष्णूचे वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरुडाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे.

लक्ष्मी-नारायणाच्या ह्या मूर्ती मुंबईतील ठाकुरद्वार येथी झावबा मंदिरात होत्या, त्या लहान असल्याने तेथे त्यांची प्रतिस्थापना केली नव्हती. या मूर्ती १९२५ च्या सुमारास शहापूरमध्ये आणण्यात आल्या. सुरुवातीला मंदिर वगेरे न बांधता केवळ मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
मंदिरातर्फे कीर्तन, भजन, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती ई. धार्मिक उपक्रम राबवले जातात. ह्या व्यतिरिक्त शहापुरात संतोषी माता, अंबिका माता, शीतला माता, ताडोबा मंदिर, शिव मंदिर, साईबाबा मंदिर अशी अन्य देवदेवतांची मंदिरे आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यातही विविध देवदेवतांची मंदिरे गावोगावी आहेत

 विठ्ठल मंदिर / Vitthal Mandir Shahapur, Thane


शहापूर मधील कासारआळीत असलेले श्री विठ्ठल मंदिर एका शतकापुर्वीच आहे. ई स. १८९० चा सुमारास मंदिर उभारण्यात आले  नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याचे तत्कालीन मामलेदार कै. देव यांच्या प्रेरणेने मंदिराची स्थापना झाली. देव यांचे शिष्य कै. शंकर अमृत महाजन (कवाड भिवंडी) यांनी विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना केली. मंदिरासाठी जागा कै. विठ्ठल हजारे यांनी दिली तर शंकर केशव गोडबोले यांनी पुढे मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर व इमारत अस्तित्वात आल्यानंतर कै. शंकर महाजन यांच्या प्रयत्नाने मंदिरात उत्सव सुरु करण्यात आला. 

श्रावण शुद्धपौर्णिमा ( नारळी पौर्णिमा) ते वद्य अष्टमी हा उत्सवाचा कालावधी असतो. देवाच्या नावाने गावात भिक्षा मागून मंदिराचा सर्व खर्च भागवण्याची पद्धत स्थापनेपासून अस्तित्वात आली. मंदिराची रचना इतर नेहमीच्या मंदिरांप्रमाणे आहे. सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेला महत्व देण्यात आले आहे. सभामंडप, गाभारा, माडी, लाकडी खांब अशी साधारणपणे रचना आहे.

 वेताळ मंदिर : वेताळेश्वर / Vetal Mandir Shahapur Thane

इतर गावांप्रमाणेच शहापूरमध्ये वेताळ मंदिर दिसून येते. वेताळ हि ग्रामदेवता असून मानवाच्या भयभावानेतून या देवतेचा उदय झाला आहे. बहुतांशी ग्रामदेवता या स्त्रीदेवता आहेत मात्र वेताळ हि पुरुष देवता आहे. वेताळेश्वर हा गावाचा रक्षक मानला जातो गावाच्या कोणत्यातरी हद्दीवर हि देवता स्थापन केलेलि असते. इतर ग्रामदेवतेप्रमाणेच वेताळाची सुद्धा कोणतीही मूर्ती नसते. शेंदूर लावलेला गोलाकार, चौकोनी, आयताकृती वा काहीसा आकारहीन दगड असतो. त्याचीच पूजा केली जाते. वेताळही भूत प्रेत यांची देवता असून त्याच्या पूजनाने  भूतबाधा होवू नये वा अकाली मृत्यू येवू नये अश्या मृत्यू व भीतीच्या भावनेतून वेताळाची पूजा केली जाते.वेताळदेवता कधी उदयास आली हे सांगणे काठी आहे. शहापूरमध्ये ब्राम्हणआळीत  वेताळ मंदिर आहे. हे वेताळमंदिर शहापूरचे  ग्रामदैवत असून गावाच्या धार्मिक परंपरेत वेताळेश्वराला महत्व आहे.

शेतीची कामे सुरु करण्यापूर्वी शेतकरी कुटुंबाकडून वेताळेश्वराला नारळ अर्पण केला जातो. देवतेचा कौल घेवूनच मंगल कार्य केले जाते. प्रथेप्रमाणे जत्रा तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा, श्री गणेशोत्सव, शिवजयंती वगेरे उत्सव साजरे केले जातात. मंदिराची व्यवस्था परंपरेने गोणे कुटुंबीयांकडे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून कौलारू छपराऐवजी सिमेंट कौक्रीटचे छत तसेच पूर्वीच्या लाकडी खांबांएवजी सिमेंटचे खांब, लोकांडी दरवाजा असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. वेताळेश्वराची फेरी निघत असल्याने मंदिराला भिंती नाहीत. अश्यारीतीने हे वेताळ मंदिर शहापूरच्या धार्मिक जीवनातील महत्वाचा भाग आहे.

 राम मंदिर / Ram Mandir Shahapur

          ब्राम्हणआळीतील राम मंदिर हे एक शतकापूर्वीचे आहे. हे मंदिर इतर मंदिराप्रमाणेच साधे परंतु व्यवस्थित आहे. श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती गाभाऱ्यात चौथऱ्यावर असून त्यांच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती आहे. उजव्या व डाव्या हाताला प्रत्येकी तीन याप्रमाणे खांब असून या खांबावर आधारलेला लाकडी पोटमाळा  आहे. गाभाऱ्याच्या समोर काहीसे ऐसपैस प्रेक्षकगृह आहे. मुख्य मंदिराच्या वरती पोटमाळा किंव्हा सज्जा बांधण्याची पद्धत साधारणपणे पेशवे काळात रूढ झाली असे मानले जाते. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम विशेषत :भजन, प्रवचन, कीर्तन, किंव्हा जन्मोत्सव स्त्रीयाना बघता यावा यासाठी हि व्यवस्था सुरु झाली असे बोलले जाते. अनेक जुन्या मंदिरांची अशी व्यवस्था आहे.

         ब्राम्हणआळीतील ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कसारा येथील बागेसर हरीलाल अग्रवाल यांनी केला. तत्पूर्वी मंदिर बैठे असून जमीनही साधी सारवणाची होती. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आणि रामनवमी येथे साजरी केली जाते. त्या निमित्ताने येथे प्रवचने, कीर्तने होतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला सिमेंटने बांधलेल्या चौकोनात हनुमानाची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या वरील बाजूस शेषशाही विष्णू व त्यांचे पंचायतन चित्रित केलेले आहे.

 Manas Mandir Shahapur


Manas Mandir Shahapur, Jain Mandir Shahapur, Jain Temple Shahapur, Manas Mandir Shahapur History, How to reach Manas Mandir Shahapur, Manas Mandir Shahapur distance

Manas Mandir Shahapur, Jain Mandir Shahapur, Jain Temple Shahapur, Manas Mandir Shahapur History, How to reach Manas Mandir Shahapur, Manas Mandir Shahapur distance



भुवनभानू जैन मंदिर शत्रूंजय तीर्थ "मानस मंदिर" म्हणून ओळखले जाते.

माहुली टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले जैन मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. मंदिराची उंची 76 फूट आहे या तीर्थात घुमट, एक फार मोठी छत, कोरीवकाम व उत्तम वास्तुकला अशा सर्व गोष्टी उत्तम प्रकारे अनुभवायला मिळतात.

भगवान महावीर यांचा ब्रास पुतळा हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे. सावरोली गावाच्या नदी किनारी ह्या सुंदर मंदिराची रचना केली गेली आहे.
पलिताणा येथील जैन शत्रूंजय तीर्थाची हि एक सुंदर प्रतिकृती आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. येथून जवळच माहुली किल्ला आहे.

 Jambhe Dam Shahapur Thane



Jambhe Dam Shahapur, Jambha Dam, Jambhe Dam Overflow Shahapur, Dam Near Shahapur Thane, Maharashtra


पावसाळा सुरू झाला की मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कलयाण येथील पर्यटकांचे पाय वळतात ते शहापूरकडे. निसर्गसौंदर्य लाभलेला हा तालुका म्हणजे पर्यटकांसाठी मेजवानीच म्हणावा लागेल.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा, मोडकसागर ही जलाशये, तर ट्रॅकरसाठी माहुली किल्ला, बळवंतगड, आजा पर्वत, तर स्वछंद भिजण्यासाठी नरपंडी, अशोका, टँगो, माहुली हे प्रमुख धबधबे, तसेच वनविभागाचे वाफे येथील निसर्ग पर्यटन केंद्र व नुकतेच साकारणारे नक्षत्रवन, चोंढे, घाटघर प्रकल्प, मानस मंदिर, गंगा देवस्थान, अशी अनेक पर्यटन स्थळे तालुक्यामध्ये असून शनिवार व रविवारी शेकडो पर्यटक शहापुरात दाखल होत असतात.

 
लोणावळा येथील भुशी डॅम येथे होणार्‍या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचा अनुभव शहापूर तालुक्यातील भुशी डॅम म्हणजेच जांभे धरणावर येतो. हे धरण जलसंपदा विभागाच्या मालकीचे असून वर्षाकाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. यामध्ये पावसाळी येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहापूरपासून जवळच असलेल्या या जांभे धरणावर यथेच्छ पांढर्‍या शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात. विशेष म्हणजे लहान मुलांसाठीही इथे भिजताना कोणतीही भीती नसल्यामुळे लहान मुलेदेखील भिजण्याचा आनंद घेतात. एकंदरीत कुटुंबासोबत जाण्यासाठी हे जांभे धरण एक छान पर्याय आहे. हे धरण भरलयापासून हजारो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. या धरणासमोरच स्वयंभू शिवमंदिरदेखील आहे. या ठिकाणी जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे जेवण सोबतच घेऊन जावे लागते.



कसे पोहचावे ?

मुंबईहून रेल्वेने येत असाल तर आसनगाव स्टेशनला उतरून शहापूरच्या बस स्थानकाजवळ जांभे गावात जाणार्‍या प्रवासी गाड्या उभ्या असतात. तसेच शहापूर बस स्थानकातूनही एसटी बस असतात अन्यथा मुंबई-नाशिक महामार्गावरून शहापूर येथे यावे व येथून १५ किमी अंतरावर शहापूर-मुरबाड रोडवर १० किमी गेलयावर शेंद्रूण येथे यावे व येथून जांभे गावाकडे जाणारा रस्ता आहे. तसेच कल्याण-नगरमार्गे मुरबाडवरूनदेखील या ठिकाणी येता येते. एकंदरीत आठवड्याच्या शेवटचे शनिवार व रविवार कुटुंबासोबत पांढर्‍या शुभ्र पाण्याचे शहारे अनुभवायचे असतील तर जांभे धरणाला नक्की भेट द्या.

 Tansa Dam Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra

 

Tansa Dam Shahapur, Tansa Dam Overflow, Tansa Dam Histroy, Tansa Dam Information, Where is Tansa Dam, Most Famous Dam of Mumbai, Maharashtra.

Tansa Dam Shahapur, Tansa Dam Overflow, Tansa Dam Histroy, Tansa Dam Information, Where is Tansa Dam, Most Famous Dam of Mumbai, Maharashtra.


शहापूर तालुका हा धरणांचा तालुका म्हटले तर वावगे ठरु नये. तानसा, वैतरणा, भातसा ही मोठी धरणे तर खराडा, जांभा डोळखांब ही छोटी धरणे तसेच चोंढा प्रकल्प ही शहापूर तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीची मुंबईची पाण्याची गरज ही तीन मोठी धरणे पूर्ण करीत आहेत. यातील तानसा धरण हे एक शतकापूर्वीचे आहे. हे धरण मुंबईला दररोज सुमारे दोन कोटी गॅलन पाण्याचा पुरवठा करते. मुंबईबरोबरच धरण परिसरातील मोहिली, अघई, वेहडवाल, नेवरा, खलिंग अशा जवळपासच्या गावांनासुद्धा पाणी पुरवले जाते. तानसा जलवाहिन्यांमार्फत पाणी पवई, पोगाव या ठिकाणी पोहचवले जाते आणि तेथून ते मुंबईला जाते. मुंबईच्या उपनगरातील भांडुप येथे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प आहे.


तानसा तलावाच्या बांधकामाचा प्रथम नकाशा मुंबई नगर पालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मेजर हेक्टर टलो आर. ई. यांनी काढून त्यावर एक अहवाल इ.स.१८७२ मध्ये सादर केला. १० ऑगस्ट १८८३ रोजी थॉमर्स ब्रेनी यांच्या सुचनेनुसार अलिवंट आणि डब्ल्यू. जे. बी. क्लार्क यांनी हे काम हाती घेतले. तत्पूर्वी कॉर्पोरेशनने ठराव मंजूर केला. या संपूर्ण कामासाठी त्यावेळी एक कोटी ५० लक्ष रुपये खर्च आला. ३१ मार्च १८९२ रोजी तलाव खुला करण्यात आला. या कार्यक्रमाला भारताचे व्हॉईसरॉय आणि गर्व्हनर जनरल तसेच नामदार लॉर्ड हॅरिस ( मुंबईचे गव्हर्नर) आणि नामदार मार्किक्स ऑफ लेन्स डाऊन उपस्थित होते. बांध घालण्याचे काम मेसर्स टी. ग्लवर अँड कंपनीने तर नळ घालण्याचे काम मेसर्स बालबेट मिचल आणि कंपनीने केले. त्यावेळी धरणाची उंची ४०५ फूट होती.

१९१२ मध्ये धरणाच्या विस्तार म्हणजेच उंची वाढविण्यात येऊन ती ४९४.५८ फूटावर नेण्यात आली. त्याच वर्षी जोड जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले. १९९५ मध्ये हे काम पूर्ण झाल. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. आर. केंडेल यांच्या कारकिर्दित एस. जे. ट्रिवेसस्मिध जलअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व आराखड्यानुसार हे काम करण्यात आले. त्यामुळे प्रतिदिन २१ दशलक्ष गॅलन होणारा पाणीपुरवठा ४० दशलक्ष गॅलनपर्यंत वाढला. तलावाचे क्षेत्र ६ चौरस मैलवरून ७ चौरस मैलपर्यंत वाढले आणि धरण क्षमता १८,६०० दशलक्ष गॅलन्सवरुन २९,०४१ दशलक्ष गॅलन्स इतकी वाढली. तानसाजवळील नेवाज गावापासून ते घाटकोपर पर्यंत ५०" व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यात आली आणि घाटकोपर पासून मुंबई पर्यंत ४८" व्यासाची ओतीव लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली. या कामाचे उद्घाटन लॉर्ड बिलियन यांनी ८/१२/१९९८ रोजी केले. जलवाहिन्या टाकण्याचे काम मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील मेसर्स फर्ग्युसन प्रोप्रायटर्स लि. या कंपनीने केले तर धरणाची उंची वाढविण्याचे काम मेसर्स पालनजी एदूलजी कॉम्सन (मुंबई) यांनी केले.

तानसा धरणाची अंतिम स्वरुपाची कामे १९२१ मध्ये सुरु होऊन १९२६ मध्ये पूर्ण झाली. धरणाची उंची अंतिम पातळीपर्यंत वाढविणे, बहिर्गामी विहीर बांधणे, आटगांव पासून तानसापर्यंत खडीचा पक्का रस्ता, धरणापासून पवईपर्यंत ७२" व्यासाची आणि पवईपासून मुंबईपर्यंत ५७ व्यासाची अशा दोन जलवाहिन्या टाकणे. जलवाहिन्या टाकलेल्या मार्गाच्या बाजूने तानसापासून मुंबईपर्यंत रस्ता तयार करणे (२४ फूट रुंद) अशी कामे हाती घेण्यात आली. सदर काम मुंबई महानगरपालिकेचे जलअभियंता एच. जे. ट्रिवेसस्मिथ यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार व मार्गदर्शनानुसार करण्यात त्यावेळ हुग बायई क्लेशन महानगरपालिकेचे आयुक्त होते. यासाठी ५४० दशलक्ष रुपये खर्च आला. धरणाची उंची वाढविण्याचे काम मेसर्स तेजुकाया and बिल्डिंग कंपनीने केले. जलवाहिनीवरील मार्ग तयार करण्याचे काम मेसर्स दि टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीने  आणि वसई खाडीवरील पूल बांधण्याचे काम मेसर्स बेथवाईट अँड कंपनी इंजिनिअर्स लि. यांनी केले.

या सर्व कामामुळे तानसा धरणातून प्रतिदिनी उपलब्ध होणारा पाणीपुरवठा ४० दशलक्ष वरुन ९० दशलक्ष गॅलन्स इतका वाढला आणि धरण क्षमता २९,०४१ दशलक्ष गॅलन्स वरुन ३५,६०० दशलक्ष गॅलन्स इतकी वाढली. अशा रितीने ब्रिटिशांच्या पुढाकाराने ज्याप्रमाणे शहापूर तालुक्यात रेल्वे आली, मुंबई आग्रा हमरस्ता सुरु झाला, त्याप्रमाणे आटगाव जवळ तानसा धरण प्रकल्प आणि त्यानंतर खर्डी (वैतरणा) येथे मोडक सागर वैतरणा धरण प्रकल्प सुरु झाला की ज्यामुळे मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली.

 Modak Sagar Dam, Vaitarna, Thane, Mumbai, Maharashtra

Modak Sagar Dam Vaitarna, Modak Sagar Dam News, Modak Sagar Dam Information in Marathi, Modak Sagar Lake, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.

Modak Sagar Dam Vaitarna, Modak Sagar Dam News, Modak Sagar Dam Information in Marathi, Modak Sagar Lake, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra. 

 शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी वैतरणा हे एक महत्त्वाचे धरण आहे. मुंबई - कसारा रेल्वे मार्गावरील खर्डी या कसारा आधीच्या रेल्वे स्टेशनपासून वैतरणा हे गाव व धरण १६ किमी अंतरावर वसलेले आहे. खर्डी स्टेशनवरुन कसारा लोकलला कनेटेक्ड राज्य परिवहन मंडळाची बससेवा असून खाजगी जीप सुद्धा येथे जातात. खर्डी स्टेशनवर उतरुन पश्चिम खडी गावातून वैतरणा धरणाकडे जाणाऱ्या जीप उपलब्ध होतात. तसेच खर्डी स्टेशनवरुन बसेस आहेत. खर्डी गावातच ३०० वर्षांची परंपरा असलेले सोनाई मातेचे मंदिर आहे. वैतरणा धरण समुद्रसपाटीपासून ५३५ मीटर उंचीवर आहे. या


नैसर्गिक उंचीमुळे उताराचा फायदा मिळून पाणी पंपशिवाय जाते.  एप्रिल १९४९ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाले व पुढील ६ वर्षांत नोव्हेंबर १९५१ रोजी काम पूर्ण झाले आणि ६ ऑक्टोबर १९५५ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन झाले. संपूर्ण भारताचा पसारा ३२ कि.मी. असून खोली २७१ फूट आहे. बांधकामाला १७.१६ करोड रुपये खर्च आला. या धरणाला जागतिक कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचना तज्ज्ञ कै. नारायण विनायक तथा नानासाहेब मोडक यांच्या स्मरणार्थ मोडकसागर असे सुद्धा संबोधले जाते.

संपूर्ण धरणात एकूण आठ गेट आहेत. त्यापैकी चार गेट्स ॲटोमॅटिक आणि चार इलेक्ट्रीक आहेत. ॲटोमॅटिक गेट्स २६ ४० तर इलेक्ट्रीक गेट्स २४४० आहेत. धरणाला दोन मल्टीगेट असून त्याची साईज १७२१ फूट आहे. पाण्याचा गाळ बाहेर निघावा म्हणून मल्टी गेट्स उघडली जातात. साधारणपणे ५३५ फूट नंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू लागते. धरणाचे एकूण तीन भाग आहेत. त्यांना गॅलरी असे म्हणतात. सर्वांत मागील वरचा भाग (Upper) त्यानंतर मधला भाग आणि सर्वांत खालचा म्हणजे तळभागाला (Lower) असे म्हणतात. मुंबईला पाणीपुरवठा करणारी इंटेक गेटस आहे ते चार प्रकारचे आहे. पाण्याची पातळी ४६०, ४८०, ५१०, ५२० अशी आहे. संपूर्ण धरण ३६ सांध्यांपासून बनलेले आहेत.

धरणाचे पाणी मुंबईला जाण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण केल जाते. या फिल्टरप्लॅन्टमध्ये वाळू रेतीचा वापर केलेला आहे. क्लोरीनचा वापर केला जातो. पाणी निर्जंतूक केले जाते आणि नंतर त्याचा मुंबईला पुरवठा केला जातो.

इतर तीन धरणांप्रमाणे वैतरणा धरणही पावसाळ्यातील एक दिवसीय सहलीचे एक चांगले ठिकाण आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रेस्ट हाऊसमध्ये Advance बुकिंग करुन राहण्याची सोय होते. भरुन वाहणारे धरण, अजूनही चांगल्या प्रकारे अस्तित्वात असलेले वन, हिरवीगार वनश्री, भरपूर पाऊस, रहाण्याची उत्तम सोय यामुळे वैतरणा धरण हे सहलीचे उत्तम ठिकाण आहे.

 Bhatsa Dam Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra

Bhatsa Dam, Bhatsa Lake and Dam, Bhatsa Dam Information, Where is Bhatsa Dam, Bhatsa Dam Distance, Bhatsa Dam Picnic Spot, Bhatsa Dam Capacity, Bhatsa Dam History, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.

Bhatsa Dam, Bhatsa Lake and Dam, Bhatsa Dam Information, Where is Bhatsa Dam, Bhatsa Dam Distance, Bhatsa Dam Picnic Spot, Bhatsa Dam Capacity, Bhatsa Dam History, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.

 शहापूर तालुक्यातील मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठा नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी धरण हे त्याचे वैशिष्ट्य आहे. उल्हास नदीची भातसा ही उपनदी असून या नदीवर हे धरण बांधले असल्याने त्याला भातसा प्रकल्प हे नाव प्राप्त झाले आहे. पण प्रत्यक्षात हे धरण भातसा नदी व चोरणानदीच्या संगमावर बांधले आहे. मुख्य नदी भातसा नदी असल्याने त्याला भातसा प्रकल्प म्हणतात. या नदीला भातसई असेही संबोधले जाते. शहापूर तालुक्यातील साजिवली गावाच्या ठिकाणी हे धरण बांधलेले आहे. भातसानदी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडे जाताना कसारा घाट ओलांडल्यावर ठाणे जिल्हा हद्द व नाशिक जिल्हा हद्द यांच्या सरहद्दीवर उगम पावते आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ती येतांना तिला चोरणा, भारंगी यासारख्या नद्या येऊन मिळतात. भातसा धरण शहापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. शहापूरपासून नाशिककडे जाताना सुमारे १२ कि.मी. अंतरानंतर उजव्या हाताला जाणारा रस्ता असून तेथून सुमारे ८ कि.मी. भातसा प्रकल्प लागतो. प्रकल्प असल्याने सर्व श्रेणीच्या लोकांची निवासस्थाने, बाजार कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय, उत्तमप्रतीचे शासकीय विश्रामगृह, भूकंपाचे मोजमाप करणारी यंत्रणा अशा सोयी या ठिकाणी आहेत.


या धरणाचे कामकाज १९६९ मध्ये सुरु करण्यात आले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरु झाले त्यावेळी १३६८ रुपये इतका खर्च हेता. १९७३ पर्यंत कामाची निर्धारीत गती कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३ पर्यंत ह्या प्रकल्पाचा  खर्च ७९६६ लक्ष रुपयांवर तर १९९४-९५ पर्यंत हा खर्च ३५८२४ लक्ष इतका पोहचला. २००० पर्यंत हे काम जवळजवळ पूर्णावस्थेला आलेले आहे. मुंबईला तानसा, वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार अशी पाच धरणे पाणीपुरवठा करतात. तो २८७७ दशलक्ष लिटर्स इतका आहे. भातसा प्रकल्पातून सुमारे ५० टक्के म्हणजे १३५० दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा केवळ या प्रकल्पातून होतो हे या प्रकल्पाचे दुसरे वैशिष्ट्य.

धरणाची कमाल उंची ८९ मीटर (सुमारे २७० फूट) असून धरणाची एकूण बांधकाम ५१८००० घनमीटर क्षेत्रात झाले असून त्यासाठी खोदकाम ७०५३० घनमीटर करण्यात आले. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौ. कि. मी. असून त्यात ९७६.१० दशलक्ष घन मीटर इतका जलसंचय केला जातो. पूर्ण संचय पातळी १४५०५ मीटर आहे.

या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडण्यात येणारे पाणी याच नदीवर पिसे येथे बंधारा बांधून त्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. उदंचन पद्धत ही या धरणाचे तिसरे वैशिष्ट्य तर विद्युतनिर्मिती करून वापरलेले पाणी बोगद्याद्वारे पुन्हा नदीत सोडले जाते. हे सुद्धा या धरणाचे वैशिष्ट्य आहे. या धरणाच्या पायथ्याशी एक विद्युत गृह बांधले असून एका व्हर्टिकल जनरेटरच्या मदतीने ३६.३० घनमीटर प्रती सेकंद इतके पाणी वापरुन त्यापासून १५ मेगॉवॉट इतकी विद्युत निर्मिती केली जाते.

या धरणाचा उजवा कालवा ६७ किलोमीटर लांबीचा तर डावा कालवा ५४ किमी लांबीचा आहे. या कालव्याच्या वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, उल्हास, कुंभारी अशा वेगवेगळ्या शाखा असून ९१ किमी. लांबीच्या शाखा कालव्याद्वारे सिंचन होणार असून उजव्या कालव्याने १६६६८० हेक्टर तर डाव्या कालव्याने ६३२० हेक्टर क्षेत्र ओलीस येणार आहे. या धरणामुळे एकूण २३००० हेक्टर इतके सिंचन क्षेत्र आहे. भातसा नदीच्या भुमरी या उपनदीवर सारंगपुरी या गावाजवळ ७२.४० दशलक्ष घन मीटर क्षमतेचे धरण बांधले जाणार असून त्यासाठी ५०५१ लक्ष खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने भातसा धरणामुळे मुंबईला पाणीपुरवठा अधिक जमीन

सिंचनाद्वारे ओलीताखाली आणणे आणि विद्युतनिर्मिती अशी तीनही उद्दिष्टे साध्य होणार असल्याने याला बहुउद्देशीय प्रकल्प म्हणणेच योग्य ठरेल. जुलै महिन्यानंतर धरण ओसंडून वाहू लागते त्यावेळी पावसाळ्यात येथील सौंदर्य अवर्णनीय असते. येथे विश्रामगृहाची सोय आहे, परंतु पूर्वसूचना देऊन ते आरक्षित करावे लागते. विश्रामगृहातून दिसणारे संपूर्ण धरण, कालव्यातून व धरणांतून पाणी बाहेर पडण्याचा आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, पक्ष्यांचे कुंजन, विश्रामगृहातून दिसणारा सूर्योदय, आजूबाजूस असणारी फिरण्याची ठिकाणे या सर्वांमुळे हे ठिकाण पावसाळ्यातील एक दिवसाचे सहलीचे उत्तम ठिकाण आहे. मात्र हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने रीतसर पूर्व परवानगी घेऊन येणे आणि किमान सुरक्षिततेते नियम पाळणे केव्हाही महत्त्वाचे.








No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...