दक्षिण सह्याद्री मधील भटकंती – भाग 1
भारतीय उपखंडात असणार्या पर्वत मालिकांमध्ये, सह्याद्री पर्वतराजी ही एक प्रमुख मानली जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून सरासरी साठ ते सत्तर किलोमीटर (काही झाले तरी शंभर किलोमीटर अंतराच्या आतच) अंतरावर असलेली ही पर्वत राजी उत्तर–दक्षिण दिशांना अंदाजे 1600 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक पासून सुरूवात करून भारतीय उपखंडाच्या पार दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी पर्यंतचा भाग या पर्वतराजीने व्यापलेला आहे. या पर्वतराजीच्या घाटमाथ्यावर आणि दोन्ही बाजूंच्या उतारांवर अतिशय घनदाट अशी विषुववृत्तीय पावसाळी जंगले (tropical rain forests) पसरलेली आहेत. काही ठिकाणी तर ही जंगले पार समुद्र किनार्यापर्यंत पोचलेली आढळतात.गोवा व केरळ या दोन ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा वगळल्या तर ही पर्वत राजी अगदी सलग रित्या उत्तर दक्षिण पसरलेली आहे.
सह्याद्री पर्वतराजीच्या दक्षिण भागातील जंगलांकडे जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. यापैकी पहिला रस्ता, जो नकाशावर पाहिले असता अगदी थेट, जवळचा आणि सुलभ वाटतो तो म्हणजे पनवेल मार्गे असलेला मुंबई–गोवा महामार्ग! गोव्याच्या पुढे हाच रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 म्हणून ओळखला जातो. या मार्गाने सरळ अंकोला या गावापर्यंत गेल्यावर, डावीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 आपल्याला डाव्या बाजूला दिसतो. या महामार्गावर वळून थेट येल्लापूर गावापर्यंत जायचे. हे येल्लापूर गाव या जंगल विभागाच्या केंद्रस्थानी आहे असे म्हटले तरी चालेल. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता म्हणजे एक वैताग वाडी आहे. रस्त्याची देखभाल योग्य होत नाही. या रस्त्याला महामार्ग नाव असले तरी बहुतेक ठिकाणी तो जेमतेम दोन गाड्या जाऊ शकतील एवढाच रूंद आहे व या रस्त्यावरून मालवाहतुक प्रचंड प्रमाणात चालत असल्याने या रस्त्याचा पर्याय नाकारणे हाच शहाणपणा ठरतो.
येल्लापूर पर्यंत पोचायला दुसरा मार्ग मात्र थोडा लांबचा असला तरी उत्तम आहे. मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे वरून पुण्याला यायचे. मग अतिशय सुस्थितीत असलेला चौपदरी पुणे–बंगळुरू महामार्ग ( क्रमांक 4) पकडायचा. या रस्त्यावरून हुबळीला डावीकडे राष्ट्रीय महामार्ग 63 लागतो. त्यावरून येल्लापूर गाठायचे. रस्त्याचा हा दुसरा पर्याय मात्र कमीतकमी त्रासदायक आहे यात शंकाच नाही.
याच रस्त्यावरून मी आता हुबळीवरून येल्लापूरकडे चाललो आहे. हुबळी शहराच्या जवळपास असलेली शहरी वाहतुक, नियंत्रक दिवे आणि गर्दी ही सर्व आता मागे पडत चालली आहे. रस्ता प्रथम ग्रामीण भागातील सुपीक अशा शेत जमिनींच्या मधून जाताना दिसतो आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतांत कापणीला आलेली ज्वारीची व इतर उभी पिके दिसत आहेत. मात्र आणखी दहा पंधरा किलोमीटर पुढे गेल्यावर हे चित्र बदलू लागले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेत जमिनी अजूनही दिसत आहेत व त्यात उभी पिकेही आहेत. मात्र आता मला सगळीकडे फक्त भात शेती दिसू लागली आहे. काही ठिकाणी भाताची रोपे अजुनही लुसलुशीत हिरवी दिसत आहेत तर काही ठिकाणी ती कापणीला योग्य झालेली अशी सोनेरी पिवळी दिसत आहेत. येल्लापूरच्या मी जसजसा जवळ जातो आहे तसतशी ही भाताची शेते आता सलग न दिसता मधून मधूनच दिसत आहेत. या शेत जमिनींच्या मधे मधे, सुंदर दिसणारे निळ्याशार रंगाचे जलाशय आता नजरेसमोर येत आहेत तर मधून मधून ऊंचऊंच झाडांचे घोळकेही नजरेसमोरून जात आहेत.
हळूहळू या बाकीच्या सर्व गोष्टी कोठे अदृष्यच होत आहेत व चहूबाजूंचा ताबा आता फक्त ऊंचऊंच व सरळसोट झाडांनी तेवढा घेतलेला दिसतो आहे. रस्त्याच्या आजूबाजूला आता बघण्यासारखे काही उरलेलेच नाही. दिसत आहेत ती फक्त ऊंचऊंच झाडे. मोठ्या पानांची, छोट्या पानांची, पांढरट पानांची किंवा काळसर हिरव्या रंगाच्या पानांची! मी आता एका घनदाट व विषुववृत्तीय पावसाळी जंगलामध्ये पोचलो आहे. झाडांच्या बुंध्यांजवळ, नानाविध प्रकारची झुडपे व गवत विपुल प्रमाणात उगवलेले दिसते आहे. या हिरव्यात मधूनच डोळ्यांना खुपणारे वाळक्या झाडांचे बुंधे आडवे पडलेले दिसत आहेत. हे बुंधे व ओंडके, शेवाळी आणि अनेक प्रकारच्या वेली यांनी संपूर्णपणे आच्छादून गेलेले आहेत.
दक्षिण सह्याद्री वरची घनदाट जंगले
मी आता येल्लापूर गावाला पोचलो आहे. भारतातील सर्व साधारण खेडेगावे दिसतात तसेच काहीसे हे गाव दिसते आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या व त्यातल्या त्यात बर्या दिसणार्या एका हॉटेलात मी चहाची ऑर्डर देतो. हॉटेल मात्र झकपक आहे. मालक चेहर्यावरून चांगला सुशिक्षित वाटतो आहे. कर्नाटकच्या या भागातील लोक मात्र एकूण दिसायला सुस्वरूप वाटतात हे खरे! मी हॉटेलच्या मालकाशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करून बघतो. परंतु हॉटेलच्या मालकाला माझ्याशी बोलण्यात काहीच रस नाहीये हे जाणवल्याने माझा प्रयत्न सोडून मी चहा शांतपणे पिऊन टाकतो व माझ्या मार्गाला लागतो. येल्लापूर गावाच्या पुढे असलेल्या एका फाट्यावर, शिरसी गावाकडे जाणार्या रस्त्याला मी आता लागलो आहे. हा रस्ता खूपच अरूंद व खड्यांनी भरलेला आहे. मात्र दोन्ही बाजूंना असलेली घनदाट झाडी मात्र तशीच आहे.
या रस्त्यावर पुढे असलेल्या एका जंगल रिसॉर्ट मधे राहण्यासाठी मी आरक्षण करून ठेवले आहे. थोडे अंतर पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक अगदी अरूंद, लाल मातीने माखलेला रस्ता मला दिसतो आहे. हा रस्ता अर्थातच मातीचा आहे व दोन्ही बाजूंनी वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांच्या फांद्यांनी पुढे जाता येईल की नाही या बाबत मनात संदेह निर्माण होतो आहे. मात्र आमची गाडी पुढे जाते व जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका पटांगणाजवळ येऊन थांबते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या या पटांगणात शंभराच्या वर तरी नारळाची व सुपारीची झाडे मला दिसत आहेत. समोर दोन रांगांच्या मध्ये कौलारू व टुमदार दिसणारी निवास स्थाने बांधलेली आहेत. एका बाजूला एक मोठी इमारत दिसते आहे. त्या इमारतीत बहुदा भोजन गृह असावे असे मला वाटते. या रिसॉर्टच्या दाव्याप्रमाणे वीज पुरवठा, गरम पाणी व केबल टीव्ही सारख्या सर्व आधुनिक सुखसोयी या रिसॉर्टमध्ये उपलब्ध आहेत.
पुढच्या दोन तीन तासातच माझ्या हे लक्षात येते आहे की या सर्व सुखसोयी शिरसी गावाकडून येणार्या काही विद्युत तारांच्या सुस्थितीवर अवलंबून असल्याने निसर्गाने जरा जरी प्रतिकूलता दर्शवली तरी त्या क्षणार्धात अदृष्य होऊ शकतात. गंमतीची गोष्ट म्हणजे सुखसोयींच्या उपलब्धतेच्या या अनिश्चिततेचा, माझ्यावर काहीच परिणाम होत नाहीये. त्याचे कारण माझ्या लक्षात येते आहे. या ठिकाणी इतके शांत व आरामदायी वातावरण आहे की वीज प्रवाह चालू आहे किंवा नाही याचा कोणावर फारसा फरकच पडत नाहीये. या आधुनिक सुखसोयी प्रत्यक्षात किती शुल्लक व किरकोळ महत्वाच्या आहेत हे येथे आल्यावर माझ्या मनाला पटते आहे.
दुपारचे जेवण जरा उशीरानेच मिळाले असले तरी या रिसॉर्ट मध्ये जी एक अद्भुत शांतता आहे त्यामुळे नंतर माझे डोळे कधी मिटतात ते मला कळतच नाहीये. कंटाळवाण्या लांबच्या प्रवासानंतर शरीराला आलेला शीण जाऊन पूर्णपणे ताजेतवाने झाल्यावरच मला जाग येते आहे. घड्याळात पाहिले तर 4 वाजून गेले आहेत. आजूबाजूला असलेल्या ऊंचऊंच वृक्षांनी, आसमंतात आपल्या काळसर छाया पसरायला सुरूवात केलेली असल्याने, सूर्यास्त अजून काही तासांवर असला तरी, एक प्रकारची काळोखी आतापासूनच जाणवू लागली आहे. गरमागरम चहाचा एक कप प्यायल्यानंतर आता संध्याकाळी जवळच असलेला एक तिबेटी बौध्द मठ बघायला जायचा बेत ठरतो आहे. कर्नाटक मध्ये दोन अतिशय मोठे असे तिबेटी बौद्ध मठ आहेत. त्यातला एक कूर्ग जिल्ह्यातील कुशल नगर येथे तर दुसरा जवळच्याच मुंडगोड गावाजवळ आहे. कुशल नगरच्या मठाला मी साधारण दीड वर्षापूर्वीच भेट दिली आहे व काही महिन्यापूर्वीच लडाखमधील अनेक बौद्ध मठांना भेट दिली असल्याने मला खरे म्हणजे आणखी एका या बौद्ध मठाला भेट देण्यात तितकेसे स्वारस्य नाही. परंतु कॅम्पवर बसून तरी काय करणार? या विचाराने मी बाहेर जायला तयार होतो आहे.
चीनने 1955 मध्ये तिबेटचा भाग गिळंकृत केल्यानंतर, चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या तावडीत सापडू नये म्हणून दलाई लामांसह अनेक तिबेटी नागरिक भारतात आश्रयासाठी आले. त्यापैकी काही तिबेटी निर्वासितांचे पुनर्वसन, कर्नाटकमध्ये दोन ठिकाणी करण्यात आले होते. यासाठी त्यांना जागा वगैरे मोफत देण्यात आली होती. मुंडगोड गावाजवळ पुनर्वसन झालेल्या तिबेटी बौद्धपंथीयांनी तेथेच “ Gaden Jangtse Thoesam Norling Monastery” या नावाचा हा बौद्ध मठ उभारलेला आहे.
मठाची इमारत अतिशय भव्य आहे. एका बाजूला असलेला गोल आकाराचा जिना चढून मी मुख्य प्रार्थना कक्ष किंवा दु–खांग मध्ये प्रवेश करतो. या विशाल कक्षाच्या एका टोकाला एक स्टेज बांधलेले आहे. या स्टेजच्या मागच्या बाजूस असलेल्या भिंतीलगत एका काचेच्या शो केसमध्ये बौद्ध धर्मियांना आदरणीय असलेल्या भव्य अशा मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या पैकी मैत्रेय बुद्ध व तारा यांच्या मूर्ती मी लगेच ओळखू शकतो आहे. या शिवाय चारी दिशांचे संरक्षण करणार्या दिक्पालांची भव्य चित्रे असणारे बॅनर्स या मूर्तींच्या मधल्या भागात व बाजूच्या भिंतींच्यावर टांगलेले दिसत आहेत. कक्षाला भेट देऊन परत असताना अतिशय संथ सूरातला पण मोठा आवाज असलेला घंटानाद माझ्या कानावर पडतो. त्या सुरांबरोबर लाल व केशरी रंगाचे अंगरखे परिधान केलेल्या अनेक भिख्खूंची त्या कक्षात प्रवेश करण्यासाठी मोठी धावपळ उडताना दिसते आहे. या प्रार्थना कक्षाच्या लांबीला समांतर ओळींत हे बौद्ध भिख्खू आसनस्थ होताना दिसत आहेत. मोठ्या गंभीर सुरातील पण नादरम्य अशी त्यांची प्रार्थना सुरू होत असतानाच मी तेथून काढता पाय घेतो आहे.
दिक्पालाचे चित्र रंगवलेले बॅनर
मी रिसॉर्टला परततो तेंव्हा मिट्ट काळोख पसरलेलाच आहे. दोन्ही रांगामधील निवासस्थानांमधले दिवे सोडले तर बाकी सगळीकडे संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य आहे. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या त्या अंधारात त्या निवासस्थानांमधील दिवे हीच काय ती जीवनाची खूण आहे असे मला वाटत राहते.
रात्रीचे भोजन भोजन कक्षात दिले जाते. रात्री झोपताना मी अंथरूणावर आडवा पडतो व खोलीतील दिवे बंद करतो. एक अत्यंत गडद व मिट्ट अंधार मला गिळून टाकतो. हा अंधार एवढा गडद आहे की वर उचललेला माझा स्वत:चा हात सुद्धा मला दिसू शकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किरकिरे रातकिडे किंवा क्रिकेट्स यासारख्या कोणत्याही कीटकाचा आवाज सुद्धा मला ऐकू येत नाहीये. जंगलामध्ये इतकी नीरव शांतता रात्री असू शकते हे मला अनुभवण्यास मिळते आहे. हा गडद अंधार व नीरव शांतता मला अवकाशातील एखाद्या निर्वात पोकळी सारखी भासते आहे. काही क्षणातच मला गाढ झोप लागते.
(क्रमश
4 नोव्हेंबर 2011
दक्षिण सह्याद्री मधील भटकंती- भाग 2
घनदाट जंगलाच्या मध्ये पहाट लवकर उगवतच नाही. सभोवताली असलेली गर्द झाडी सकाळच्या सूर्याचे सोनेरी कोवळे किरण मुळी पूर्णपणे अडवूनच टाकते. रात्री मस्त झोप काढल्यावर माझे डोळे सकाळी उघडतात तेंव्हा आजूबाजूला अजून काळोखच दिसतो आहे. तरी सुद्धा अनेक स्वरातली चिव–चिव, कुह–कुहु, घुमणे माझ्या कानावर पडते आहे. इतक्या पहाटे व इतक्या विविध स्वरांतील पक्षांचे गायन ऐकण्याचा माझा हा बहुतेक पहिलाच प्रसंग असावा. मी उठून खिडकीजवळ जातो. बाहेर अजून अंधाराचेच साम्राज्य आहे. मात्र वर बघितल्यावर पूर्व दिशेकडच्या आकाशाला थोडी निळाई आल्यासारखी भासते आहे. मी परत एकदा अंथरूणावर आडवे पडण्याचा विचार करतो पण तेवढ्यात आज आपल्याला एका मोठ्या रोचक स्थानाला भेट देण्यासाठी जायचे आहे हे माझ्या लक्षात येते व मी दिनक्रम सुरू करण्याच्या मागे लागतो.
या भागातील स्थानिक खाद्यपदार्थ म्हणजे उप्पीट, लुसलुशीत इडल्या व त्यांच्या बरोबरीने ब्रेड, ऑमलेट असा साग्रसंगीत ब्रेकफास्ट उरकून मी आजच्या भ्रमंतीच्या कार्यक्रमाला सुरवात करतो. सकाळची हवा आल्हादकारक वाटते आहे खरी! पण थंडी जरा जास्त प्रमाणात असती तर मला अधिक रुचले असते हे नक्की! आम्ही परत एकदा सिरसी–येल्लापूर रस्त्याला लागलो आहोत. आज हा रस्ता मला अधिकच अरूंद व जास्त खड्यांनी भरलेला असा का कोण जाणे? वाटतो आहे. सिरसी हे एक मध्यम आकाराचे गाव असले तरी येथे हॉस्पिटल्स सारख्या सर्व आधुनिक सुविधा मात्र उपलब्ध आहेत. गावामधे एक स्टेडियम सुद्धा दिसते आहे. सिरसी पासून पश्चिमी समुद्र किनार्यावरचे कुमटा हे गाव, यांना जोडणार्या 69 क्रमांकाच्या महामार्गावरून आता आम्ही पुढे निघालो आहोत. सिरसी पासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर एक फाटा लागतो. या फाट्यापुढचा रस्ता अगदी लहान (एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल एवढा) आहे. या रस्त्याच्या काही भागावर अतिशय गर्द झाडी असलेली जंगले आहेत व त्यातूनच पुढे जावे लागते. या रस्त्यावरच्या खाच खड्यांतून अंदाजे 10 किलोमीटर तरी प्रवास केल्यावर आमची गाडी थांबते. पुढे गाडी जाऊ शकेल असा रस्ता अस्तित्वात नाही. या पुढची वाटचाल पायी करणे आवश्यक आहे. मी खाली उतरतो व समोर बघतो. समोर अतिशय उतार असलेला एक कच्चा रस्ता दिसतो आहे. काल रात्री बहुदा या भागात जोरदार पाऊस पडलेला असावा कारण समोरचा रस्ता भिजलेला व त्यामुळे घसरडा झालेला दिसतो आहे. आजूबाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे पावसाचा ओलावा अजून तसाच टिकून राहिलेला आहे व त्यामुळे हवा अतिशय दमट व चिकचिक करणारी आहे. बरीच काळजी घेत, पावलांकडे बघत, मी त्या उतारावरून खाली उतरतो आहे. काही अंतर गेल्यावर हा कच्चा रस्ता डावीकडे वळतो आहे. रस्त्याच्या त्या कोपर्यावर थोडी कोरडी जागा मला दिसते. मी तिथे काही क्षण थांबण्याचे ठरवून उभा राहतो व मान वर उचलून समोर पाहतो.
समोर दिसणारे दृष्य मोठे आश्चर्यचकित करणारे आहे यात शंकाच नाही. समोर दिसत असलेल्या गर्द हिरव्या झाडा झुडपांच्या मागे अगदी काळ्याभोर रंगाचा एक भला थोरला पाषाण पर्वत उभा आहे. या पर्वताला अनेक अणकुचीदार शिखरे आहेत. त्या शिखरांच्या मधे मधे तितक्याच टोकदार घळ्या दिसत आहेत. यातील काही घळ्या किंवा दर्या तर इतक्या खोल आहेत की त्यांचे तळ माझ्या नजरेच्याही खाली व समोरच्या झुडपांच्या मागे लपले आहेत. ही शिखरे व घळ्या, लाखो वर्षे पाऊस व हवेतील बदल सहन करत आलेले असल्याने, अतिशय खडबडीत झालेल्या आहेत तर त्यांच्या कडा अगदी धारदार वाटत आहेत. या प्रकारचे पाषाण पर्वत मी फक्त सायन्स फिक्शनच्या पुस्तकांतून, कोण्या चित्रकाराच्या कल्पना शक्तीतून एखाद्या परग्रहावरचे म्हणून चित्रित केलेले, फक्त चित्रात पाहलेले आहेत. अवनीतलावर असे पाषाण पर्वत अस्तित्वात असू शकतात हे मला आज प्रथमच दिसते आहे. या पाषाण पर्वताचा काळा रंग सोडला तर बाकी रूप एखाद्या दुसर्या परग्रहावरचे नक्कीच वाटते आहे. या पाषाण पर्वताला स्थानिकांनी मोहिनी शिखर असे नाव दिलेले आहे.
मी पुढे चालत रहातो. वळल्यानंतर काही मीटर अंतरावर रस्ता एकदम सपाट होतो आणि या सपाट रस्त्याच्या अखेरीस या मोहिनी शिखराचे एक मोठ्या आकारातील रूपांतर उभे आहे. या पाषाण पर्वताला भैरव शिखर असे नाव आहे. भैरव शिखर जमिनीपासून 120 मीटर उंच आहे तर मोहिनी शिखर 90 मीटर उंच आहे. झाडांच्या शेंड्यांमागे खडे असलेले हे भैरव शिखर एखाद्या किल्ल्याच्या बुरुजांसारखे दिसते. इथे असलेल्या वस्तीला यान किंवा याना असे नाव असल्याने या पाषाण पर्वतांना यान पर्वत असे नाव मिळाले आहे.
सह्याद्री पर्वतराजी ही साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी उद्रेक पावलेल्या एका ज्वालामुखीमधून बाहेर पडलेला लाव्हारसाचे घनीकरण झाल्याने तयार झालेली आहे. त्यामुळे सह्याद्रीतील बहुतांशी खडक हे बॅसॅल्ट प्रकारचे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यान मधील दोन्ही पाषाण पर्वत हे, स्फटिकावस्थेतील लाईमस्टोन या प्रकारच्या दगडाचे बनलेले आहेत. लाईमस्टोन दगड साधारण जलचर प्राण्यांचे नष्ट होणे किंवा पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम क्षारांचे स्फटिकीकरण या सारख्या कारणांनी तयार होतात. जगभरात अनेक ठिकाणी गुहांमध्ये ठिबकणार्या जलामुळे असे लाईमस्टोन पाषाण तयार झालेले दिसतात. परंतु जमिनीच्या वर तयार झालेले लाईमस्टोन दगडांचे हे पर्वत व ते सुद्धा काळ्या रंगाचे असणे हे एक नैसर्गिक आश्चर्यच म्हणावे लागेल.
मी ज्या सपाट जमिनीवर उभा आहे ती जागा या पाषाण पर्वतापर्यंत जेथे पोहोचते तेथे एक नैसर्गिक गुहा निर्माण झाली आहे.या गुहेमधे शिवलिंग असलेले एक शिव मंदिर आहे. बरेच भाविक दर्शनासाठी येताना दिसत् आहेत.मी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे रहाण्याच्या वगैरे फंदात न पडता, लांबूनच दर्शन घेतो व बाहेर येऊन भैरव शिखराचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. भैरव शिखराचे निरिक्षण करताना माझ्या असे लक्षात येते की या पाषाणाच्या डाव्या बाजूने एक रस्ता काढलेला आहे व वर जाण्यासाठी पायर्या काढलेल्या आहेत. चौकशी केल्यावर असे समजते की पाषाणाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी केलेला तो मार्ग आहे. प्रत्यक्षात माझ्या असे लक्षात येते की भैरव शिखर पाषाणाची दोन उभी शकले झालेली आहेत. या दोन शकलांच्यामध्ये असलेल्या घळीमधून एक अरूंद असलेला हा मार्ग आहे. मी प्रदक्षिणेला जाण्याचे ठरवतो.
प्रदक्षिणा मार्गाजवळील भिंतीवरच्या उभ्या घळी
भैरव शिखर हे एक पवित्र स्थान समजले जात असल्याने त्याला प्रदक्षिणा घालताना पादत्राणे काढूनच ती घालावी लागते. प्रदक्षिणेचा मार्ग बराच खडबडीत आहे व त्यावर भरपूर प्रमाणात जळवांचे साम्राज्य आहे अशी धोक्याची सूचना मला मिळते. परंतु एवढ्या लांबून येथे आल्यावर आणि या पाषाणामधल्या घळीतून चक्कर मारण्याची संधी मिळत असता, ती दवडण्याचा वेडेपणा करणे मला शक्य होत नाही व मी पादत्राणे काढून ठेवतो व पायर्या चढून पाषाणापाशी पोचतो. पंधरा–वीस पायर्या चढल्यावर या घळीच्या तोंडाशी मी पोचतो. ही घळ म्हणजे एक गुहा असल्यासारखी आहे. भैरव शिखराच्या टोकापासून निदान निम्म्या उंचीपर्यंत तरी ही अरूंद घळ पोचलेली आहे व मी आता या घळीच्या तळावर उभा आहे. मी घळीमधे प्रवेश केल्यावर लक्षात येते की घळीतून संपूर्णपणे आकाश दिसत नाही. काही ठिकाणी घळीचा वरचा भाग पूर्ण उघडा आहे तर काही ठिकाणी या घळीच्या दोन्ही बाजूंचे खडक एकमेकाला टेकलेले असल्याने एक नैसर्गिक छप्पर तयार झालेले आहे. त्यामुळे याला घळ म्हणावे की गुहा या बद्दल मनात संदेह वाटतो आहे. काही ठिकाणी या नैसर्गिक छपरात मोठ्या फटी निर्माण झाल्या आहेत व त्यातून प्रखर अशा सूर्यप्रकाशाचे किरण आत प्रवेश करू शकत आहेत. परंतु छपरातील या फटी एवढ्या उंचीवर आहेत की गुहेतील वातावरण कुंद व वाशेळे राहते आहे. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींना उभ्या घळी आहेत व त्याच्या बाजूंचे खडक धारदार आणि एखाद्या तलवारीच्या पात्यासारखे दिसत आहेत. या उभ्या घळींच्यात अनेक ठिकाणी तयार झालेल्या सपाट जागांच्यामुळेच मी ज्या मार्गाने जाऊ शकतो आहे तो मार्ग तयार झालेला आहे. वर असलेल्या अशाच सपाट जागांवर मधमाशांची पोळी लटकलेली दिसत आहेत. तांबूस करड्या रंगाची काही पाखरे माझ्या डोक्यावरून एकदम विचित्र चिवचिवाट करत गुहेच्या प्रवेशाकडे उडत जातात. मात्र ती वटवाघळे आहेत की कबुतरे हे सांगणे मला शक्य नाही. आणखी थोडी वळणे पुढे गेल्यावर मार्ग इतका अरूंद होतो आहे की जेमतेम एका माणसाला त्यातून जाणे शक्य व्हावे. पुढे मार्ग फारच अवघड झाल्यासारखा वाटतो आहे व मी 80% तरी प्रदक्षिणा पूर्ण केलेली असल्याने ती पूर्ण करण्याचा नाद सोडून देतो व आल्या मार्गाने परत फिरतो. तरी सुद्धा येताना एका ठिकाणी उभ्या दगडांवर उमललेली सुंदर पांढरी फुले माझे लक्ष वेधून घेतातच. भारतातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच यान पाषाणांना जोडलेली एक पौराणिक कथा आहेच. या शिखरांपैकी लहान शिखराला मोहिनी शिखर हे नाव देण्यामागे पौराणिक कथाच असणार, नाहीतर वेड्यावाकड्य़ा स्वरूपातला, अणकुचीदार टोके असलेला हा पाषाण, काही मोजके भूगर्भशास्त्रज्ञ व रॉक क्लाइंबर्स वगळले तर बाकी कोणाला मोहित करू शकणार आहे? परंतु मी माझे विचार माझ्याजवळच ठेवतो व रिसॉर्टवर दुपारच्या भोजनासाठी परत जाण्यासाठी म्हणून आमच्या गाडीकडे वळतो.
प्रदक्षिणा मार्ग गुंफेचे छत; आणखी एक देखावा
भोजन झाल्यानंतर आणखी अशीच एक आश्चर्यजनक जागा बघण्यासाठी मी निघालो आहे. मात्र ही जागा निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे. परत एकदा आम्ही सिरसी–येल्लापूर रस्ता पकडला आहे. सिरसीपासून साधारण 17 किलोमीटर अंतरावर एक छोटेखानी रस्ता हुळगोळ गावाकडे जातो. त्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो आहोत. साधारण 2 किलोमीटर अंतरावर समोर एक सुबक असा वाहनतळ दिसतो आहे. वाहनतळाच्या सर्व बाजूंनी गर्द झाडी आहे व बाजूला एक थंड पेये व खाद्य पदार्थ विकणारे एक दुकानही दिसते आहे. या सर्व स्वरूपावरून हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे हे उघड आहे. आमची गाडी तिथे थांबते व मी खाली उतरतो. समोरच एके ठिकाणी कडेच्या गर्द झाडीतून समोर जाण्यासाठी पायर्या दिसत आहेत. तेथे जाऊन बघितल्यावर या पायर्या एका मोठ्या उतारावरून खाली जाण्यासाठी बनवल्या आहेत हे लक्षात येते. पायर्या उतरायला सुरूवात केल्यावर आपण एका नदीकाठावर आहोत व नदी पात्राकडे जाण्यासाठी खाली उतरतो आहोत हे लक्षात येते. बर्याच पायर्या उतरल्यावर मी नदी पात्रापर्यंत पोचतो. पात्रात तसे फारसे पाणी दिसत नाही आणि संपूर्ण पात्राचा परिसर निरनिराळ्या उघड्यानागड्या खडकांनी व पाषाणांनी खचाखच भरलेला दिसतो आहे.
मात्र प्रथम नुसत्या डोळ्यांनी लक्षपूर्वक व नंतर बायनॉक्यूलर्स मधून बघितल्यावर एक आश्चर्यजनक बारकावा लक्षात येतो आहे. समोर दिसणार्या जवळ जवळ प्रत्येक खडकावर शिवलिंगे व त्याच्या समोरचे नंदी कोरून काढलेले आहेत. या शिवलिंगामुळेच शाल्मला नदीच्या पात्रातील या स्थानाला सहस्त्रलिंगम असे नाव पडले आहे. ही नदी धारवाड शहराजवळ उगम पावते व पश्चिमेकडे वहात जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही जागा मोठी प्रेक्षणीय आहे यात शंकाच नाही. मात्र हा कोरीवकामाचा उद्योग कोणी व कशासाठी केला आहे याची काहीच नक्की माहिती मिळत नाही.
सहस्त्रलिंग या ठिकाणाच्या जवळ सोंदे या नावाचे एक गाव आहे. हे सोंदे गाव एका प्राचीन राज्याची राजधानी होते. या गावाजवळ असलेल्या एका किल्याचे भग्नावशेष एवढीच काय ती या प्राचीन राज्याची खूण आता उरली आहे. या सोंदे राज्याच्या एका राजाने, गोकर्ण महाबळेश्वर येथील एक धर्मगुरूंना आपल्या राज्यात येऊन राहण्याचे निमंत्रण दिले होते. काशी मधील आद्य शंकराचार्य यांनी विश्वानंद सरस्वती या पंडितांना गोकर्ण महाबळेश्वर येथील हाविग ब्राम्हणांचे गुरू म्हणून नियुक्त केले होते. प्रस्तुत धर्मगुरू या विश्वानंद सरस्वतींचे 29वे वारसदार समजले जात. सोंदे येथील राजाने या धर्मगुरूंसाठी एक मठ शाल्मला नदीकाठी बांधून दिला होता व मोठी जमीन मठाच्या खर्चासाठी इनाम करून दिली होती. हे 29वे वारसदार धर्मगुरू व त्यांचे पुढचे 4 वारसदार यांनी या मठात शांततेने कालक्रमण केले होते. त्या काळापासूनच शाल्मला नदी पात्रातील ही जागा तेथे असलेल्या खडकांच्या विशिष्ट आकारांमुळे सहस्त्रलिंग या नावाने ओळखली जात होती. या मठातील मंडळींनी कारागिरांना बोलावून पात्रातील खडकांवर शिवलिंगे व नंदी कोरले असावेत अशी शक्यता वाटते.
हा सर्व इतिहास खरा की खोटा हे जाणून घेण्याचे कोणतेही साधन आपल्याजवळ नाही. मात्र ही जागा अतिशय नयनरम्य आहे यात शंका नाही. या सहस्त्रलिंग स्थानापासून थोडे पुढे एक झुलता पूल शाल्मला नदीवर बांधलेला आहे. तेथून नदीपात्राचा मोठा छान देखावा दिसतो आहे.
एवढे सगळे भमण एकाच दिवसात झाल्याने मला थोडी थकावट आल्यासारखी जरूर वाटते आहे. मी थोडा चहा घेण्याचे ठरवतो. चहा अर्थातच स्ट्रॉग, गोड मिट्ट आणि भारतीय परंपरेप्रमाणे अगदी दुधाळ आहे. या गरम हवेत सुद्धा हा चहा प्यायल्यावर माझ्या अंगात परत तरतरी येते व मी आजच्या ठरलेल्या बेताप्रमाणे पुढच्या ठिकाणाला जायला निघतो.
(क्रमदक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 4
आपली शाळा, तिथले वर्गमित्र, त्यांच्याबरोबर केलेली मौजमजा, यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना आपल्या आयुष्यात कहीतरी विशेष स्थान असते. तरीही शाळेतल्या दिवसांच्या माझ्या आठवणी या कृष्ण–धवल छायाचित्रांसारख्या आहेत, गतकाळातील काही क्षण फक्त त्यांनी पकडून ठेवलेले आहेत असे मला नेहमी वाटते. 1954-55 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेने कर्नाटकची एक सहल आयोजित केली होती.
मी त्या वेळी पाचवी–सहावी इयत्तेमध्ये होतो व या सहलीमध्ये मी भाग घेतला होता. या सहलीमधल्या ज्या काही थोड्याशा आठवणी अजून मला आहेत त्या सुद्धा सगळ्या अशाच कृष्ण–धवल छायाचित्रांसारख्या आहेत. या छायाचित्रांपैकी स्पष्ट आठवणारे व विस्मृतीच्या गर्तेत कधीच न दडू शकणारे असे एक चित्र एका खूप मोठ्या, खूप रूंद अशा धबधब्याचे आहे. या धबधब्यात प्रत्यक्षात चार किंवा पाच धबधबे एका शेजारी एक होते. मी हा धबधबा समोरच्या बाजूस असलेल्या एका कड्याच्या टोकावरून बघितला होता. पाणी
खूप उंचीवरून पडत होते व त्यामुळे तयार झालेल्या धुक्याने मी व समोरचा
धबधबा यांच्यामध्ये असलेली खोल दरी संपूर्णपणे भरूनच गेलेली होती. हा धबधबा जगातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असा मानला जात असे व त्या वेळेला तो गिरसप्पा धबधबा या नावाने परिचित होता.
विस्मृतीच्या कप्प्यांमध्ये दडलेले हे एक स्मृती छायाचित्र आज मी परत आठवण्याचा प्रयत्न करतो आहे याचे कारण म्हणजे याच धबधब्याला पुर्नभेट देण्याचा आमचा आज बेत आहे. हा धबधबा आता जोग फॉल्स या नावाने सुपरिचित आहे. काल संध्याकाळी मला कोणीतरी या धबधब्याला जोग फॉल्स असे नाव का दिले गेले याची एक कथा सांगितली. या कथेप्रमाणे पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाने या धबधब्यापासून 6 किलोमीटर अंतरावर मागे एक मोठे धरण 1964 साली बांधले होते. तो प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल त्या व्यावसायिकाचे नाव म्हणे या धबधब्याला आता दिले आहे. माझा विश्वास काही या कथेवर बसत नाहीये व ही एक लोणकढी थाप कोणाच्या तरी सुपीक मेंदू मधून आली असावी असा माझा कयास आहे. मला राहवत नसल्याने मी शेवटी माझ्या संगणकावर थोडी शोधाशोध करतो व माझ्या कयासाप्रमाणे ही कथा ही एक शुद्ध लोणकढी आहे हे लगेचच समजून येते. प्रत्यक्षात गिरिसप्पा या नावाचे एक खेडे शरावती नदीच्या किनार्यावर होनावर या पश्चिम समुद्र किनार्याजवळ असलेल्या गावांच्या पूर्वेला साधारण 16 मैलावर आहे व या गावाच्या नावाने हा धबधबा ओळखला जात होता. मात्र या धबधब्याजवळ रहात असलेले स्थानिक या धबधब्याला जवळच असलेल्या जोग या नावानेच प्रथम पासूनच ओळखत असल्याने शेवटी हेच नाव अधिकृत म्हणून ठरवण्यात आले आहे.
मी आता जोग फॉल्स कडे जाण्यासाठी निघालो आहे. सिरसी गावापासून सिद्दपूर गावाकडे जाण्यासाठी राज्य महामार्ग क्रमांक 93 हा रस्ता आहे व हाच रस्ता आम्ही धरला आहे. या रस्त्यावर लागणार्या कन्सूर गावापासून ते सिद्दपूरपर्यंतचा रस्ता अगदी दाट जंगलाच्या मधून जातो आहे. सिद्दपूर गावाजवळ या राज्य महामार्गाला माविनगुंडी गावाकडे जाणारा एक फाटा लागतो. या फाट्याने सरळ आले की माविनगुंडी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 206 (होनावर–शिमोगा) लागतो. या रस्त्याने सागर गावाच्या दिशेने थोडे किलोमीटर गेले की शरावती नदीवरचा पूल लागतो. या पुलापाशी आम्ही पोचलो आहोत. हा पूल ओलांडला की लगेचच एखादा किलोमीटर अंतरावर, जोग फॉल्स बघण्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेला वॅटकिन्सप्लॅटफॉर्म हा व्हिस्टा पॉइंट लागतो.
आमची गाडी एका मोठ्या पटांगणावर येऊन थांबते व मी खाली उतरतो. कर्नाटक शासनाने येथे खूप मोठी जागा प्रवाशांची वाहने ठेवण्यासाठी म्हणून विकसित केली आहे. या पटांगणाच्या बाजूला, प्रवाशांच्या सोईसाठी, स्वच्छता गृहे, उपहार गृहे व राहण्यासाठी कक्ष उपलब्ध आहेत. या पटांगणापासून, कॉंक्रीटमध्ये बनवलेला पायर्या पायर्यांचा एक रस्ता, कड्याच्या टोकाकडे व तेथून कड्याच्या परिमितीवर तुम्हाला घेऊन जातो.
गिरसप्पा किंवा जोग फॉल्स सध्याचा व पूर्वीचा
काही ठिकाणी मधे असलेल्या घळी ओलांडता याव्या म्हणून या वाटेवर टांगते पूल सुद्धा बनवलेले आहेत. या रस्त्याने कड्याच्या टोकाकडे जात असताना मी 1950 च्या दशकात परत एकदा मनाने गेलो आहे. त्या वेळी, हाच धबधबा बघण्यासाठी म्हणून मी आलो होतो व इथे फारशा काहीच सोई वगैरे उपलब्ध नव्हत्या. एका मोकळ्या जागेवर आमची बस थांबली होती व आम्ही मुले एका रांगेत शिक्षकांच्या नजरेसमोरून चालत चालत या कड्याच्या टोकापाशी असलेल्या एका बंगलेवजा इमारतीच्या पुढच्या बाजूस येऊन थांबलो होतो. या कड्याच्या टोकाजवळचा भाग तेंव्हा वॅटकिन्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात होता. या इथे उभे राहून मी जे दृष्य त्या वेळी समोर बघितले होते ते माझ्या स्मृती कोषात एखाद्या शिलालेखाप्रमाणे पक्के बसलेले आहे. मी उभा असलेल्या कड्याच्या टोकाखाली एक अतिशय खोल अशी, निदान 1000 फूट तरी खोल, एक दरी होती व या दरीच्या पलीकडच्या बाजूला, पीक कापणी करण्यासाठी शेतकरी जो विळा वापरतात त्या मुठीसकट विळ्याच्या आकाराचा, एक मोठा खडकाळ असा तुटलेला कडा दिसत होता. या खडकाळ कड्यावरून थोड्या थोड्या अंतरावरून पाण्याचे विस्तृत असे चार ओघ कडाडल्यासारखा आवाज करत खाली कोसळत होते. हे जलौघ एवढे रूंद होते की मोठ्या पांढर्या चादरी त्या कड्यावरून खाली सोडल्या आहेत की काय? असे वाटावे. कडाडून खाली आदळणार्या या जलौघांनी खाली दरीमध्ये धुक्याचा एक मोठा ढग तयार केला होता. मधून मधून वार्याबरोबर हे धुके इकडे तिकडे फेकले गेले की समोरचा निम्मा धबधबा सुद्धा दिसेनासा होत होता. आणि अचानज वार्याची दिशा आमच्या बाजूला फिरल्याने, दरीच्या विरूद्ध बाजूच्या कडांवर उभे असलेली आम्ही मुले त्या धुक्यामुळे अंगावर उडणार्या तुषारांनी मोठे आनंदित झालो होतो. त्या धबधब्याचा कडाडणारा आवाज एवढा प्रचंड होता की आमची बस ठेवली होती त्या ठिकाणांपर्यंत हा आवाज ऐकू येत होता.
1950 च्या दशकातील गिरसप्पा धबधबा आता क्वचितच, तो सुद्धा ऐन पावसाळ्यात (जुलै–ऑगस्ट मध्ये) दिसू शकतो. याचे कारण म्हणजे या धबधब्यापासून सुमारे 6 किलोमीटर मागे लिंगनमक्की या नावाचे एक मोठे धरण शरावती नदीवर कर्नाटक सरकारने 1964 मध्ये बांधले आहे. या धरणामुळे शरावती नदी मध्ये वाहणार्या पाण्याचा ओघ एकदम आटल्यासारखा झाला आहे. ऐन पावसाळ्यात जेंव्हा हे धरण पूर्ण भरून वाहू लागते त्याच वेळेस फक्त गिरसप्प्याचे पूर्ण जलवैभव आता बघता येते.
राजा, रोअरर व रॉकेट धबधब्यांचे पाणी तळाच्या जलाशयात पडताना
या धबधब्याचे 60 वर्षांपूर्वीचे जलवैभव आता काही आपल्याला पुन्हा बघता येणार नाही आणि जो धबधबा समोर दिसणार आहे तो म्हणजे पाण्याचे थोडे मोठ्या आकाराचे ओहोळ असणार आहेत याची मनाला पूर्ण जाणीव असल्यामुळे, थोड्याशा नाराजीने व अनिच्छेने मी कड्याच्या टोकाकडे असलेल्या वॅटकिन्स प्लॅटफॉर्म घेऊन जाणार्या पायवाटेने चालू लागलो आहे. कड्याच्या टोकापाशी पोचल्यावर मला समोर परत एकदा दिसते आहे तीच 1000 फूट खोल असलेली दरी व त्याच्या मागे असलेला मूठ असलेल्या विळ्याच्या आकाराचा कडा. मात्र आता या कड्याच्या टोकावरचे सर्व खडक उघडे बोडके पडलेले दिसत आहेत. साधारण मध्यान्हीची वेळ असल्याने सूर्य अगदी डोक्यावर तळपतो आहे. त्यामुळे दरीच्या अगदी तळाला असलेली, नदीच्या पाण्यातील छोटी मोठी डबकी, धबधब्यांचे पाणी जिथे खाली पडते आहे तेथे असलेला एक मोठा जलाशय आणि पात्रातील खडक अगदी स्पष्ट दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्या धुक्यामुळे मला गिरसप्पा धबधबा अतिशय गूढ व जादूचा वाटला होता त्या धुक्याचा आता मागमूसही दिसत नाहीये. प्रवाहातील कमी पाणी किंवा दुपारची वेळ यामुळे हे धुके दिसत नसावे अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतो.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच वाटते आहे की चारी धबधब्यांचे प्रवाह अजूनही पहायला मिळत आहेत. सगळ्यात डाव्या अंगाला असलेला राजा धबधबा (याला ग्रॅन्ड, मेन किंवा घोड्याच्या नाल अशीही नावे आहेत.) अजूनही दरीत 830 फूट खोल कोसळतो आहे. विळ्याच्या आकाराच्या कड्यावर मुठीपासून सर्वात दूर असलेल्या वक्राकार भागातून, हा जल प्रवाह खाली येतो आहे. आणि खाली पडताना या प्रवाहाला कोणत्याही खडकाचा अडथळा नसल्याने वरून खालपर्यंत हा प्रवाह म्हणजे एक सलग पांढर्या रंगाचा पट्टा वाटतो आहे. हा प्रवाह खाली पडताना मोठ्या सुरेख रित्या एका वक्राकार परिघावर पडतो आहे व खालच्या जलाशयाशी पोचल्यावर अनेक फवारे उडवत जलाशयाच्या पाण्यात लुप्त होतो आहे. मात्र पूर्वी हा प्रवाह जसा एक पांढरी चादर वाटत असे तसे न वाटताना एखादी पांढरी चिंधी असावी तसाच दिसतो आहे. या प्रवाहाच्या साधारण 1000 फूट डावीकडे आणि कड्याच्या विळ्याच्या आकाराच्या मुठी जवळच्या वक्राकार भागातून, दुसरा धबधबा खाली कोसळताना दिसतो आहे. हा धबधबा पूर्वी प्रचंड कोलाहल निर्माण करत असे व त्यामुळे त्याला रोअरर असे नाव होते. वैभवाच्या कालात हा रोअरर, कड्याच्या अगदी वरच्या टोकावरून राजा धबधब्याकडे तोंड करून कोसळत असे. त्यामुळे या धबधब्याचे पाणी, राजा धबधब्याच्या पाण्यावर मध्यंतरी हवेतच कोठेतरी आदळून ध्वनी गर्जना व मी वर वर्णन केलेले प्रसिद्ध धुके निर्माण करून या धबधब्याला एक गूढत्व व जादू प्रदान करत असे. आता मात्र हा धबधबा कड्याच्या वरच्या टोकावरून कोसळत नसून मधेच अर्ध्या खोलीवर कोठेतरी कड्यावरून बाहेर येतो व याचे पाणी राजा धबधब्याच्या पाण्याला अगदी तळाशी भेटते त्यामुळे याची गर्जना व धुके हे दोन्हीही लुप्त झाले आहेत. हा रोअरर किंवा गर्जणारा धबधबा बघितल्यावर याचे नाव आता कण्हणारा धबधबा असे ठेवले पाहिजे असे मला वाटते आहे. या रोअरर धबधब्याच्या सुमारे 700 फूट डावीकडे आणि विळ्याच्या मुठीच्या जागी जो धबधबा आहे त्याला रॉकेट असे नाव आहे कारण हा धबधबा प्रथम 100 फुटांची खाली उडी घेतो व या धबधब्याचे पाणी एका बाहेर आलेल्या खडकावर आदळल्यामुळे ते पाणी समोरच्या दरीत एखाद्या रॉकेट सारखी हवेत झेप घेते व त्यानंतर राजा फॉल प्रमाणेच एका वक्राकार परिघावर घरंगळत खाली येते. सुदैवाने या रॉकेट धबधब्याचे वैभव अजून बर्यापैकी टिकून आहे. हा एकच धबधबा जुन्या गिरसप्प्याची आठवण करून देऊ शकतो आहे. या रॉकेट धबधब्याच्या सुमारे 500 फूट डावीकडे शेवटचा म्हणजे राणी धबधबा आहे. या धबधब्याचे जुने नाव ल दाम ब्लांच असे होते. आता याला राणी धबधबा असे म्हणतात. हा धबधबा खालच्या खडकांच्यावर मलमलची चादर पांघरलेली दिसावी तसा हळूवारपणे घरंगळत खाली येताना दिसतो आहे. अर्थात आता पाणी कमी असल्याने चादरीऐवजी मलमलची पट्टी पांघरावी असे दिसतो आहे.
गिरसप्पा किंवा जोग फॉल्सची तुलना जगातल्या नायगारा सारख्या मोठ्या धबधब्यांशी पूर्वी केली जात असे. आता मात्र याची तुलना मध्यम आकाराच्या धबधब्यांशी करणेही कठिण आहे. फक्त पावसाळ्यात या धबधब्याची गणना आता जगातील मोठ्या धबधब्यांशी करणे शक्य आहे. वॅटकिन्स प्लॅटफोर्म वरून जोग फॉल्स कडे बघत असताना धबधब्याच्या उजवीकडे मला सुबक व छान दिसणारे 3 बंगले दिसत आहेत. मी असे वाचले आहे की रॉयल इंजिनियर्स या सैनिकी पलटणीतील एक अधिकारी कॅप्टन क्रुकशॅन्क यांनी या ठिकाणी 1868 मध्ये एक चुन्यामध्ये बांधकाम केलेला एक बंगला, वरिष्ठ ब्रिटिश अधिकार्यांसाठी म्हणून बांधला होता. समोर दिसणार्या घरांपैकी एखादे अजून त्याच वेळचे आहे का आता ते पाडून नवे बांधले गेले आहे? हे कळण्यास मला तरी वाव नाही. त्या वेळेस या बंगल्यातून दिसणारा व्ह्यू अतिशय अप्रतिम आणि स्वप्नवत होता. हा बंगला धबधब्याच्या इतका जवळ होता की पाण्याच्या गर्जनेने घराची दारे खिडक्या हादरत असत. या बंगल्यातून आज धबधबा दिसत तरी असेल का? या बाबत माझ्या मनात शंका आहे. अर्थातच धबधब्याच्या गर्जनेचे आता कण्हण्यात रूपांतर झालेले असल्याने तो आवाज या बंगल्यात ऐकू येण्याचीही सुतराम शक्यता वाटत नाही.
वॅटकिन्स प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूंना असलेल्या डोंगराच्या कडांवर आता कर्नाटक सरकारने व्हिस्टा पॉइंट्स व त्यांना जोडण्यासाठी टांगते पूल बांधले आहेत त्यावरून मी एक फेरफटका मारतो. खरे तर सर्व धबधबे वरच्या टोकापासून खालपर्यंत दिसू शकतील अशी जागा फोटो काढण्यासाठी मी शोधतो आहे. तशी जागा मला सापडते पण तेथून काढलेले फोटो मात्र निराशाजनक आहेत.
जोग फॉल्स बघून झाल्याने मी परत गाडीकडे वळतो आहे. येताना लागलेल्या शरावती नदीवरचा पूल परत न ओलांडता त्याच्या उजव्या बाजूने असलेल्या एका रस्त्याने मी आता कारगल या गावाकडे निघालो आहे. पुढे परत एक पूल लागतो मात्र हा पूल शरावती नदी वरचा नसून एका मानव निर्मित नदीवरचा आहे. लिंगनमक्की धरणात अड्वलेले शरावतीचे पाणी या कॅनॉल मधून शरावती जल विद्युत केंद्राकडे नेण्यात येते. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन ही संस्था हा प्रकल्प चालवते. या लिंगनमक्की धरणाने अडवलेल्या पाण्याचा जलाशय पावसाळ्यात तुडुंब भरला की जास्त आलेले पाणी सोडून न देता पश्चिम बाजूला असलेल्या तलकालाली या दुसर्या जलाशयात साठवले जाते. पुण्याजवळच्या पानशेत व वरसगाव येथील जलाशय जसे एकमेकाला लागून व मधे असलेल्या एका टेकडीमुळे विभाजित होतात तसाच काहीसा प्रकार येथे दिसतो आहे. मात्र ही दुभाजक टेकडी अतिशय घनदाट अशा अरण्याने माखलेली आहे. या जंगलातून असलेल्या रस्त्याने आता आम्ही दक्षिणेकडे असलेल्या कारगल या गावाकडे निघालो आहोत. मात्र आजूबाजूचे जंगल हे बहुदा गेल्या अर्ध शतकात म्हणजे धरण पूर्ण झाल्यावरच एवढे फोफावलेले असावे. कारगल गाव ओलांडून पुढे गेल्यावर काही किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याचा एक फाटा लागतो. हा रस्ता अतिशय अरूंद आहे. आमची गाडी जेमतेम या रस्त्यावरून जाऊ शकते आहे. थोडे पुढे गेल्यावर समोर एक प्रवेशद्वार व त्यावर असलेली कमान दिसते आहे. कमानीच्या बाजूला असलेला ” मोपाणी अभयारण्यामध्ये तुमचे स्वागत असो” असा फलक मला दिसतो आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रवेशद्वार कुलुप लावून बंद केलेले आहे. एकूण सगळा गोंधळच आहे. आम्ही काही कालापूर्वी ओलांडून आलेल्या कारगल गावातील ऑफिस मधून प्रवेश पत्रिका आम्ही घेऊन येणे गरजेचे आहे असे तिथल्या काही मंडळींचे म्हणणे दिसते आहे. गरम व जोरदार चर्चा, उशीर व एकूण गोंधळ भरपूर झाल्यानंतर शेवटी एक कर्मचारी सायकलवरून किल्ल्या घेऊन येताना दिसतो व दार उघडले जाते. 30 ते 40 मिनिटे रस्त्याच्या बाजूचे सृष्टी वैभव बघून कंटाळलेल्या आम्हाला अखेरीस अभयारण्यात प्रवेश मिळतो आहे.
मोपाणी अभयारण्यामधील रस्ता इतक्या वेड्यावाकड्या वळणांचा व चढउतारांचा आहे की आमची गाडी तो 3 किलोमीटरचा रस्ता अगदी कण्हत कुंथत पार करते आहे. अखेरीस जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोकळा जागेत गाडी थांबते व मी खाली उतरतो. चहू बाजूंना नजर फिरवल्यावर लक्षात येते की सगळीकडे घनदाट अशी झाडी आहे की ज्याच्यातून सूर्यप्रकाशही खालपर्यंत उतरू शकत नाहीये. फक्त समोरच्या बाजूच्या झाडीमधून आणखीनच अरूंद असा एक कच्चा रस्ता वळणाआड लपलेला दिसतो आहे. या रस्त्याने फार फार तर एखादी जीप जाऊ शकेल. पुढे आता चालत जाण्याशिवाय काही प्रत्यवाय नाही हे लक्षात आल्याने मी चालायला सुरूवात करतो. चालायला लागल्यावर लक्षात येते की घनदाट झाडीमुळे या रस्त्याने चालणे खूपच सुखकर वाटते आहे. अर्धा किलोमीटर चालल्यानंतर समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. या जलाशयाच्या किनार्यावर पोचल्यावर लक्षात येते आहे की हा जलाशय, मागची झाडी आणि किनारा यामुळे हे स्थळ नितांत रमणीय बनले आहे.
हे स्थळ म्हणजे प्रत्यक्षात कर्नाटक शासनाने उभारलेली ही एक पर्यटक छावणी आहे. येथे एक पर्यटक निवास आहे. पर्यटकांना तंबू ठोकण्यासाठी मोकळी जागा आहे. ज्यांना जंगलांची आवड आहे अशांसाठी ही पर्यटक छावणी म्हणजे एक पर्वणीच आहे. समोरच्या तलावाचे पाणी शांत आणि मनोहर आहे. येथे तुम्ही पोहू शकता. किनार्यावर स्वैपाकपाणी करू शकता आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाला पूर्ण विसरून विरंगुळ्याचे चार क्षण निवांतपणे घालवू शकता. समोर दिसणारा जलाशय लिंगनमक्की जलाशय आहे की तालकालाली जलाशय आहे हे सांगणे मला मोठे कठिण वाटते आहे. आमच्या प्रवासाची दिशा बघितली तर कदाचित हे तालकालाली सरोवर असू शकेल असे मला वाटते. आजूबाजूच्या कोणालाही विचारून काहीच फायदा नाही कारण इंग्लिश किंवा हिंदी जाणणारे कोणी दिसत नाहीयेत. मात्र सगळे फलक किंवा नकाशे मात्र हा जलाशय लिंगनमक्की आहे असे सांगतात त्यामुळे कदाचित हा जलाशय लिंगनमक्की असू शकतो.
मोपाणी अभयारण्यातील जलाशयाचा किनारा
अभयारण्यातील घनदाट झाडी मधील रस्ता
या जलाशयाच्या काठावर थोडा काल व्यतीत केल्यावर मी परतीच्या मार्गाला लागतो. परत एकदा जोग फॉल्सच्या परिसरातून जाताना माझ्या मनाला प्रश्न पडतो. आता भविष्यकालात माझ्या स्मरणात कोणता धबधबा राहील? 60 वर्षांपूर्वी बघितलेला गिरसप्पा धबधबा की मोठे ओहोळ या स्वरूपातला जोग धबधबा? तुम्ही उत्तराचा नक्कीच अंदाज बांधू शकाल. शाळेच्या सहलीत बघितलेला गिरसप्पा हा कोणत्याही क्षणी आणि परिस्थितीत आज बघितलेल्या जोग फॉल्स वर सहज मात करू शकेल.
(क्रमदक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 5
जोग
धबधब्याला भेट दिल्यानंतर झालेल्या निराशेवर दुसर्या एखाद्या धबधब्याला
भेट देणे हा उत्तम उपाय असू शकेल असा एक विचार काल संध्याकाळी कोणीतरी
मांडला. मागोड धबधब्याला सध्या भरपूर पाणी असल्याची माहिती पण कोणीतरी दिली. सर्वांनाच ही सूचना पसंत पडली व आज परत मागोड धबधब्याच्या एका नव्या जंगल सफारीला जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सकाळी गेल्या काही दिवसांप्रमाणेच, इडली, उप्पीठ, नीर
डोसा आणि त्याच्या जोडीला गरमागरम ऑमलेट असा मस्त ब्रेकफास्ट आज पण झाला
आहे व सफारीहून परत यायला थोडा उशीर झाला तरी चालण्यासारखे आहे.
मागोड धबधब्याला जाण्यासाठी असलेला एकुलता एक रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ( हुबळी–कारवार रस्ता) या रस्त्याला येल्लापूरच्या पश्चिमेकडे साधारण 3 किलोमीटरवर एक फाटा लागतो तेथून पुढे सरळ दक्षिणेकडे जातो. त्यामुळे साहजिकच आम्ही प्रथम येल्लापूरकडे निघालो आहोत. येल्लापूर या गावाला मध्यम आकाराचे गाव असे म्हणता येईल. हुबळी–कारवार रस्ता गावातून जात असल्याने साधारण 25000 वस्ती असलेले हे गाव महामार्गावरील सर्वसाधारण गावे असतात तसेच आहे. हे गाव मला तरी अगदी लोणावळा खंडाळ्याची आठवण करून देते आहे. गावातून जाणार्या महामार्गाच्या बाजूला, अनेक चहाच्या टपर्या, वाहन–देखभाल करण्यासाठी गॅरेजेस व बरा दर्जा असलेली उपहारगृहे व दुकाने दिसत आहेत. आज दिवाळीचा दिवस असल्याने येल्लापूर मार्केट फुलांच्या ढिगांनी नुसते सजलेले दिसते आहे. झेंडू, मोगरा या सारखी फुले मोठ्या ढिगांनी विकली जात आहेत. घरांची प्रवेशद्वारे, गाड्या, मोटर सायकली या सारख्या सर्व गोष्टी फुलांच्या माळांनी सजवलेल्या आहेत. साधारणपणे अशा आकाराच्या गावातून जाताना उघड्या गटारांमुळे प्रथम आपल्याला लक्षात येतो तो एक विशिष्ट दुर्गंध! आज मात्र येल्लापूर मध्ये नाकाला जाणवतो आहे तो धुंद करणारा मोगर्याचा सुवास. येल्लापूर मार्केट मधील एकूण गर्दी, उलाढाल बघून सुपारीच्या व्यापारामुळे हे एक सधन झालेले गाव आहे हे लगेच लक्षात येते आहे. अर्थात गावाच्या बाहेर अनेक मैलांपर्यंत हिरवीगार भातशेती सर्व बाजूंना दिसतेच आहे.
मागोड फाट्यावर वळल्यानंतर लगेचच अतिशय घनदाट अशी झाडी आमचे स्वागत करते आहे. रस्ता अतिशयच अरूंद आहे व रस्त्याच्या दोन्ही कडांना असलेल्या ऊंचऊंच झाडांच्या फांद्या व काटक्या एकमेकात इतक्या अडकून किंवा मिसळून गेल्या आहेत की वरून येणार्या सूर्यप्रकाशाला सुद्धा वाट काढणे मुष्कील व्हावे. या रस्त्याने थोडे पायी चालावे या विचाराने मी खाली उतरतो. मी काही वनस्पतीतज्ञ नाही तरीही बाजूच्या जंगलात असलेली साग, जांबा, किंजल, सावर व जांभूळ या सारखी झाडे मला लगेच ओळखू येतात. काली रात्री बहुदा येथे जोरदार वादळ झाले असावे कारण जमिनीवर तुटलेल्या फांद्या व काटक्या यांचा खच पडला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मला काही फूट तरी ऊंच असलेले एक मुंग्यांचे वारूळ दिसते आहे. या वारूळाचा आकार एखाद्या किल्यासारखा वाटतो आहे. मुंग्यांना जात्याच बहुदा वास्तुबांधणी शास्त्र अवगत असले पाहिजे.
मागोड रस्त्यावरील मुंग्यांचे वारूळ
मागोड गाव येल्लपूरहून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यापैकी 12 किलोमीटर अंतर जंगलातील हा अरूंद रस्ता आहे. या रस्त्याची परिस्थिती व चिंचोळेपणा यामुळे वाहन चालवणे म्हणजे एक परीक्षाच असल्याने हे अंतर कापायला आम्हाला 1 तासाहून अधिक काल लागला आहे. मागोड गावातील घरे तशी मोठ्या भागावर पसरली असावीत असे वाटते कारण गावाच्या मध्यभागी फक्त 2 किंवा 3 घरे दिसत आहेत. या गावाला येताना शेवटचे काही किलोमीटर रस्ता तर सदाबहार अशा गच्च हिरव्यागार जंगलातून आलेला आहे. मागोड गावात एक वाहनतळ आहे तेथे आमची गाडी थांबते व मी खाली उतरतो. पर्यटकांना आवश्यक अशा स्वच्छतागृहासारख्या थोड्या सुविधा येथे उपलब्ध केलेल्या दिसत आहेत. मागोड गावापासून खूप उतार असलेली एक छोटी पायवाट पुढे जाते. या पायवाटेवर काही ठिकाणी पायर्या बांधलेल्या असल्याने मार्ग काढणे तसे सोपे आहे. ही पायवाट प्रथम वळणावळणाने एका अरूंद खिंडीत खाली उतरते व ही खिंड पार केल्यावर पुढे चढाचा रस्ता लागतो. हा रस्ता समोर असलेल्या एका बर्यापैकी ऊंच व बांबूची दाट वने असलेल्या एका टेकडीवर चढतो व टेकडीला वळसा घालून परत खिंडीपर्यंत येतो. या सर्व रस्त्याच्या किंवा पायवाटेच्या पूर्वेकडच्या बाजूला ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधून सुरेख व्हिस्टा पॉइंट्स बनवलेले आहेत. तेथे उभे राहिले की समोर 800 फूटाची उडी घेणार्या मागोड धबधब्याच्या भव्य दर्शनाचा आनंद मनमुराद लुटता येतो.
मागोड या पदपथाने फिरत मी मागोड धबधब्याचे चांगले छायाचित्र कोठून घेता येईल हे बघतो आहे. मागोड धबधबा बेडथी या नदीवर आहे आणि या धबधब्याला जोग फॉल्स सारखे पाण्याचे दुर्भिक्ष नसून भरपूर पाणी असल्याने या धबधब्याला भेट देण्याची कल्पना योग्यच होती असे म्हणता येईल. मात्र या धबधब्याची एकूण ऊंची 800 फूट असली तरी जोग फॉल्स सारखा हा धबधबा ही ऊंची एका उडीत घेत नाही. प्रथम बेडथी नदी उतारावरची अनेक वळणे (Rapids) घेत खळखळाट करत एका मोठ्या जलाशयात येते. व या जलाशयातून अधिकच गतीमान होऊन 200 फुटाची एक जबरदस्त उडी घेते. यानंतर ही नदी एका बाजूला असलेल्या 800 फूट उंचीच्या सरळ कड्यामुळे एका अंगाला दाबली गेल्याने या कड्याला लागून असलेल्या घळीतून, मी उभा आहे त्या टेकडीच्या तळाला, सबंध टेकडीभोवती चक्कर मारते. टेकडीच्या दुसर्या बाजूला बटरमिल्क फॉल्स या एका धबधब्यामधून वाहत आलेले सोंदे नदीचे पाणी या नदीला येऊन मिळते व त्या नंतर या प्रवाहाला गंगावल्ली असे म्हटले जाते. ही गंगावल्ली नदी या बिंदूपासून पश्चिमेला वहात जाते. 200 फुट उडी घेणारा पाण्याचा प्रवाह एवढ्या जोराने खाली पडतो आहे की त्यामुळे तळाला धुक्याचा एक मोठा ढग तयार झाला आहे. डोक्यावर दुपारचा सूर्य तळपत असल्याने त्या प्रकाशात या धुक्यामध्ये तयार झालेले एक दुहेरी इंद्रधनुष्य मला दिसते आहे.
धबधब्याच्या तळाजवळ तयार झालेले धुके
हे अप्रतिम सुंदर दृष्य जास्तीत जास्त जेवढा वेळ बघणे शक्य होईल तेवढा वेळ मी या टेकडीवर काढतो आहे. परंतु वेळ खूपच भरभर चालला आहे व परतण्याची वेळ जवळ आली आहे. परत फिरताना प्रथमच माझे लक्ष आजूबाजूला जाते. अनेक काळेभोर डोळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत हे माझ्या लक्षात येते. मागोड परिसरात खूपच माकडे आहेत व प्रवाशांच्या हातात काही खाद्यवस्तू असली तर एका सेकंदात त्यावर डल्ला मारून ती पळवण्याच्या प्रयत्नात ही माकडे असतात.
परतीच्या प्रवासात आमची गाडी एका बाजूच्या कच्च्या रस्त्यावर वळते व चंदगुळी नावाच्या अगदी एका छोट्या खेड्याजवळ उभी राहते. या खेड्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे आहेत. यापैकी एका घराच्या छतावर कळस दिसतो आहे. जवळच लावलेल्या एका फलकाप्रमाणे हे गणेशाचे मंदिर आहे. चंदगुळी सिद्धिविनायक मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते. या गणेश मंदिराचे एक मोठे गंमतीदार वैशिष्ट्य आहे. या मंदिराला भेट देणारे भाविक गणेशाला त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराची घंटा देवापुढे वाहत असतात. त्यामुळे हे मंदिर एक घंटांचे संग्रहालय झाले आहे. अगदी छोट्या घंटांपासून भरभक्कम घंटेपर्यंत सर्व प्रकारच्या घंटा भाविकांनी देवाला वाहिलेल्या आहेत. या मंदिराच्या भिंती, ओसरी, छत आणि प्रवेशद्वार हे घंटांनीच सजवलेले आहे. या गणपतीला घंटा ग़णेश असेही नाव पडलेले आहे.
मी गाडीत बसतो व आम्ही पुढे निघतो. आता आम्हा सर्वांच्या पोटात कावळे चांगलेच कोकलू लागले आहेत. तरीही आम्ही वाटेतच लागलेल्या एका मोठ्या सुंदर दिसणार्या जलाशयाशी थोडा वेळ थांबतोच. या जलाशयाचे नाव कवडीकेरे असे आहे. जलाशयातील पाणी मोठे नितळ, स्वच्छ वाटते आहे. जलाशयाशेजारीच एक देवीचे मंदिर आहे. हा सर्वच परिसर अतिशय रमणीय आहे यात शंकाच नाही. मंदिराला एक धावती भेट देऊन आम्ही आता परतीच्या मार्गावर आहोत. आजची आमची सफर छान झाल्याने समाधान वाटते आहे. जेवण झाल्यावर नंतर आराम करायला भरपूर वेळ आहे.
सह्याद्री पर्वतराजी तसे बघायला गेले तर मला काही नवीन नाही. माझे पुण्यातले घर या पर्वतराजीमधल्या काही टेकड्यांच्या अगदी जवळ आहे. अगदी लहानपणापासून मी या टेकड्यांवर मनमुराद भटकलो आहे. परंतु याच सह्यराजीच्या दक्षिण भागात फिरण्याचा हा गेल्या काही दिवसांचा अनुभव मला नवीन व हृद्य असाच वाटतो आहे. दक्षिण सह्याद्री परिसर उत्तरेपेक्षा निराळाच आहे. घनदाट जंगले, नितळ पाण्याचे निसर्गरम्य जलाशय, धबधबे हे तुम्हाला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात. दक्षिण सह्याद्री मधली माझी ही सफर आता संपल्यासारखी असली तरी स्मृती पटलावरून ती पुसली जाणे माझ्या उर्वरित आयुष्यात तरी शक्य वाटत नाही.
(समाप्त)
21 नोव्हेंबर 2011
रहस्यमय जगत!
जगातील
प्रत्येक राष्ट्राची स्वत:ची म्हणून काही रहस्ये किंवा गुपिते असतात.
दुसर्या देशांबरोबरचे गुप्त करार, सैनिकी तयारी किंवा शस्त्रे-अस्त्रे
याबद्दलची माहिती या सारखी माहिती या रहस्यांत मोडते. देश अणवस्त्रधारी
असला तर अशा अस्त्रांची संख्या,ठेवण्याचे स्थान व त्यांची क्षमता ही सुद्धा
गुप्त माहितीच असते. मात्र देशाच्या सीमेपासून हजार मैल तरी दूर असलेल्या
एका पर्वतराजीच्या पर्यावरणासंबंधीची माहिती ही राष्ट्राच्या रहस्यांत मोडू
शकेल यावर तुमचा विश्वास बसूशकेल का?
भारतातील मध्यवर्ती सरकारच्या ‘जंगले व पर्यावरण‘ मंत्रालयाने गेले काही महिने, सह्याद्री किंवा पश्चिम घाट या भागातील पर्यावरणासंबंधी एका अहवालाच्या बाबतीत इतकी गुप्तता बाळगली आहे की हा पर्यावरण संबंधी अहवाल आहे की संरक्षण खात्याने कोणत्यातरी सीमाभागातील सैनिकी तयारी बाबत तयार केलेला अहवाल आहे, या बाबत मनात संभ्रम निर्माण व्हावा. पर्यावरण मंत्रालयाने हा अहवाल गुप्त व दडवून ठेवलेला रहावा यासाठी जे उद्योग गेले काही महिने चालू ठेवले आहेत ते बघता, हे जग किंवा विश्व खरोखरच रहस्यमय आहे याबाबत कोणाचीही खात्री पटल्याशिवाय राहणार नाही.
भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्यालगतच असलेली सह्यपर्वतांची सलग रांग, महाराष्ट्रातील नाशिक येथपासून ते दक्षिणेला पार केरळमधील कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतराजी प्रमाणेच सह्यपर्वतराजी महत्त्वाची समजली जाते. घनदाट जंगले, जैविक विविधता व अनेक महत्वाच्या नद्यांची उगमस्थाने यामुळे या पर्वतराजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिवाय अनेक शेतकरी, शेळ्या–मेंढ्या पालन करणारे धनगर, मासेमार या पर्वतराजीच्या छत्राखाली पिढ्या अन पिढ्या उपजीविका करत आलेले आहेत. गेली काही दशके या सह्यपर्वतराजीमधील पर्यावरणावर जंगलतोड, खाणकाम उद्योग, धरणे बांधकाम व फार्म हाऊसेस बांधण्यासाठी बडे बिल्डर यांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण चालू आहे. या सगळ्या उद्योगांमुळे या भागात रहाणार्या स्थानिकांमध्ये सुद्धा असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.
मार्च 2010 मध्ये ‘जंगले वा पर्यावरण‘ मंत्रालयाने ख्यातनाम पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती नियुक्त केली. सह्याद्री पर्वतराजी आणि आसपासच्या प्रदेशात प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? या प्रदेशात खाणकाम, जंगलतोड, धरणे व बडे बिल्डर यांच्या होत असलेल्या सततच्या आक्रमणांमुळे पर्यावरणावर प्रत्यक्षात काय परिणाम झाला आहे? याचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यास या समितीला सांगण्यात आले. डॉ. माधव गाडग़ीळ यांची झालेली नियुक्ती अतिशय योग्य होती असे म्हणावेसे वाटते कारण एकतर गाडगीळ हे पुण्याचे असल्याने सह्याद्री पर्वतराजीच्या अंगाखांद्यावरच त्यांचे बालपण गेले आहे व पुढे बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये संशोधन करत असताना सह्याद्रीच्या पर्यावरणाचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. तसेच पर्वतांचे पर्यावरण टिकवून ठेवून पर्वतराजीचा लाभ कसा करून घेता येईल? याबद्दलचे त्यांचे विचार बहुश्रुत आहेत. मार्च 2010 ते ऑगस्ट 2011 या दीड वर्षाच्या कालावधीत या समितीने या प्रश्नाचा संपूर्ण अभ्यास केला. सह्याद्री पर्वतराजीचे अनेक दौरे केले व या प्रश्नाशी जिव्हाळ्याचा संबंध असणार्या सर्वांशी चर्चा केली. त्यांच्या या कार्याची कल्पना खालील आकड्यांवरून यावी. समितीच्या 14सभा झाल्या. त्यांनी सरकारी अधिकार्यांबरोबर 8वेळा बैठकी घेतल्या. समाजसेवी संस्थांबरोबर त्यांच्या 40बैठका झाल्या आणि या कालखंडात त्यांच्या विद्यमाने, तज्ञांचे 42प्रबंध सादर केले गेले.
सप्टेंबर 2011मध्ये या समितीने आपला 300 पानी अहवाल मंत्रालयाला सादर केला. येथपर्यंत सर्व गोडीगुलाबीत व ठीक चालले होते. हा अहवाल सादर झाल्याबरोबर मंत्रालयात एकदम रहस्यमय हालचाली सुरू झाल्या आणि मंत्रालयाने हा अहवाल प्रसिद्ध करण्याचेच नाकारले. या समितीत कार्य करणार्या काही जणांनी अतिशय बहुमोल असे संशोधन कार्य केलेले असल्याने, त्या कार्याची जाणीव सरकारने ठेवावी व त्यांचा यथोचित गौरव करावा. ही श्री. गाडगीळ यांची विनंती सुद्धा सरकारने नाकारली.
या सरकारी प्रतिसादावरून गाडगीळ समितीचा अहवाल किती माहितीपूर्ण व अचूक असणार आहे याची कोणालाही कल्पना येईल. पर्यावरण
मंत्रालयाच्या या कृती मागे काहीतरी काळेबेरे असणार आहे अशा भावनेने
निरनिराळ्या समाजसेवी संस्थांनी केलेली या अहवालाच्या प्रसिद्धीची मागणी
जेंव्हा मंत्रालयाने फेटाळून लावली तेंव्हा शेवटी केरळ राज्यातील एका
सक्रिय संस्थेने या बाबतीतली आपली तक्रार ‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ यांचेकडे नोंदविली आणि हा अहवाल प्रसिद्ध व्हावा अशी मागणी केली. या
माहिती कमिशनरांनी जेंव्हा मंत्रालयाला हा अहवाल प्रसिद्ध का केला नाही
म्हणून विचारणा केली तेंव्हा मंत्रालयाने दिलेले उत्तर मोठे मासलेवाईक होते. “हा अहवाल प्रसिद्ध करणे हे राष्ट्राच्या शास्त्रीय व आर्थिक हितसंबंधाना बाधा आणू शकेल म्हणून हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही.” आता या उत्तरापुढे कोण काय बोलणार? यानंतर याच मंत्रालयाच्या एका अधिकार्याने अशी मल्लीनाथी केली की ” हा अहवाल प्रसिद्ध केला तर सह्याद्रीमधील अनेक भाग पर्यावरण दृष्टीने अतिशय नाजूक अवस्थेत असल्याने ते संरक्षित ठेवले जावेत, अशा मागण्यांचा महापूर मंत्रालयाकडे येण्याची भिती असल्याने हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही.” सरकारचे म्हणणे संपूर्णपणे नाकारून मागच्या महिन्यात ‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ यांनी सरकारला हा अहवाल प्रसिद्ध करण्याची आज्ञा केली. ही आज्ञा देतांना 1975मधील
न्यायमूर्ती मॅथ्यू यांच्या निवाड्याचा संदर्भ देऊन माहिती कमिशनर यांनी
आज्ञापत्रात सांगितले आहे की या देशातील लोकांना सार्वजनिक क्षेत्रात
करण्यात येणार्या प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. गाडगीळ समितीचे कार्य अशा प्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रामधील कार्य असल्याने त्या कार्याची माहिती करून घेण्याचा जनतेला हक्क आहे.
‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ यांचा निवाडा आपल्या विरूद्ध गेला आहे हे समजल्यावर अहवाल प्रसिद्ध न करता मंत्रालयाने परत ‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ यांचेकडे अपील केले. मागच्या आठवड्यात या अपीलावर माहिती कमिशनर यांनी निर्णय दिला. पर्यावरण मंत्रालयाचे अपील पूर्णपणे नाकारून 5मे 2012 या
तारखेपर्यंत अर्जदाराला गाडगीळ अहवालाची झेरॉक्स प्रत देण्यात यावी व हा
अहवाल मंत्रालयाच्या वेबसाईटवर ठेवण्यात यावा असा आदेशही कमिशनर यांनी
काढला. हा आदेश देताना कमिशनर यांनी आपल्या निकालपत्रात अतिशय मार्मिक विवेचन केले आहे. ते म्हणतात की,” लोकशाही मध्ये नागरिक हे सरकारचे सर्वसत्ताधीश असल्याने, त्यांना
वगळून शासकीय कर्मचार्यांनी कोणतेही निर्णय घेणे आणि असे निर्णय करताना
त्याची कारणे सत्ताधीश असलेल्या नागरिकांना न सांगणे हे मान्य होऊ शकत नाही. शास्त्रीय आधारावर तयार केलेले अहवाल लोकांच्या पुढे मांडून त्यावर शासन व सामान्य नागरिक यात सुसंवाद घडून येणे गरजेचे आहे. असे जर केले नाही तर सर्वसाधारण नागरिकाच्या मनात शासनाने घेतलेले निर्णय लहरीपणे किंवा भ्रष्टाचाराने घेतलेले आहेत, अशी भावना रूढ होईल व नागरिकांच्या मनात सरकारबद्दल फक्त अविश्वास उरेल.”
‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ कडून एवढी जबरदस्त चपराक मिळून सुद्धा पर्यावरण मंत्रालयाचा पीळ गेलेला नाही. ‘सेन्ट्रल इन्फरमेशन कमिशनर‘ यांच्या निर्णयाविरुद्ध मंत्रालयाने आता न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे अर्थातच गाडगीळ समितीच्या अहवालाची प्रसिद्धीही पुढे ढकलली गेली आहे.
पर्यावरण मंत्रालय असे कां करते आहे? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! तुमच्या– माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या लक्षात जे यायचे आहे ते आलेच आहे!
आहे की नाही रहस्यमय जगत!
12मे 2012

























No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.