
"आई आपण बर्फात कधी जायचं ?"
अगदी ५-६ वर्षांची असल्या पासून आमची लेक प्रत्येक सुट्टी जवळ आली की
आम्हाला म्हणायची.. एकदा अगदी सगळं ठरवता ठरवता काश्मीर ट्रिप फिसकटली
होती..
त्यानंतर लांबतच गेली..
गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी नक्कीच कुठेतरी मोठी ट्रिप काढू असं ठरलं आणि
काश्मीर ला जायचंच असं म्हणून जानेवारी पासूनच "अभ्यास" सुरू केला.
शॉपिंग,बॅग्स वगैरे वगैरे तयारी सुरू झाली.
आमची customized tour असणार होती त्यामुळे तिथे गेलं की कधी कसं फिरायचं ते आमचं आम्ही ठरवणार होतो..
वेगवेगळे ब्लॉग वाचून itinerary बनवली आणि ती 4 वेळा बदलून पण झाली.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बर्फ दिसणार होता त्या गुलमर्ग केबल कार ची तिकीट्स बुक केली..
पण इतकं सगळं साधं सोपं नसतं देवा.
काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय प्रवासाला कसली मजा.
पहिला गोंधळ पुण्यातच सुरू झाला.
जायच्या काही दिवस आधी आमच्या विमान कंपनी चा मेसेज आला की जायच्या दिवशीची पुणे ते श्रीनगर flight cancelled..
झालं
सगळ्या प्लॅंनिंग चा बँडबाजा... रात्री अपरात्री च्या flights नको होत्या म्हणून मुद्दाम दिवसाची flight ठरवली होती तर नेमकी तीच कॅन्सल..
मग कस्टमर केअर ला 10 वेळा फोन.. विमानाचे नवे पर्याय असं करत करत दूसरे विमान बुक झालं.
आणि..
14 मे 2022...
Finally... आम्ही उडायला तयार होतो..

15 मे 2022..
सकाळी 11 वाजता श्रीनगर मध्ये पोचलो.विमान उतरतानाचे दृश्य बघूनच शब्दशः "दिल गार्डन गार्डन" असं झालं. विमानतळावर पण जिथे जागा मिळेल तिथे हिरवळीचे तुकडे आणि त्यातून डोकावणारी गुलाबाची फुलं..
पुणे 34 डिग्री >> दिल्ली 40 डिग्री >> श्रीनगर 18 डिग्री असा टप्पा सुमारे बारा-तेरा तासात पार केला होता..
विमानतळावर उतरताच पहिल्यांदा जॅकेट चढवलं.
बाहेर आलो तर ट्रॅव्हल कंपनीचा माणूस हातात माझ्या नावाचा वेलकम बोर्ड घेऊन उभा होता...आपल्या नावाचा बोर्ड घेऊन माणूस उभा असायचा हा पहिलाच प्रसंग.मज्जाच वाटली.
हा माणूस म्हणजे इनायत भाई.. पुढचे 6 दिवस आमच्या सोबत असणार होता.
सगळं सामान पटापट गाडीत भरून आमचा प्रवास सुरु झाला तो पहलगाम च्या दिशेने..
"मंजिल से बेहेतर रास्ते" चा प्रत्यय काश्मीर मध्ये कुठेही प्रवास करताना येतो तसाच किंबहुना त्याहून सुंदर असा हा प्रवास होता.रास्ते तर सुंदर होतेच पण मंजिल सुद्धा तितकीच सुंदर.
पहलगाम ला जाताना वाटेत केशराची शेते दिसली. म्हणजे सध्या केशराची फुलं नव्हती पण तरी दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेतात जेव्हा केशराची जांभळी फुलं फुलत असतील तेव्हा किती सुरेख दृश्य दिसत असेल याची कल्पना करूनच मस्त वाटलं..
वाटेत जेवण आणि काश्मिरी कहावा चा आस्वाद घेऊन पहलगाम च्या दिशेने निघालो..
Welcome to Pahalgam ची कमान लागली आणि किती पाहू आणि किती नको अशी अवस्था झाली..
डावीकडे अखंड खळाळत वाहणारी लीडर नदी, आभाळाशी स्पर्धा करणारे पाईन चे वृक्ष, हिरवेगार डोंगर,चिनार आणि अक्रोडची झाडं असं सुरेख चित्र समोर उभं होतं.सुरवातीला उत्साहात दाणादण फोटो काढत सुटलो पण नंतर लक्षात आलं की हे दृश्य फोटोत मावणारच नाही.. मग गपचूप कॅमेरा आत टाकला आणि डोळ्यात साठवून घ्यायला सुरुवात केली..

साधारण 3 वाजता आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो..
Hotel Pahalgam Retreat..
लीडर नदीच्या काठी असलेले आणि हिरव्या डोंगरांचा नजारा दाखवणारे हे सुरेख टुमदार हॉटेल बघून प्रवासाचा सगळा शीण गायब.
लीडर च्या पाण्याचा खळखळाट अखंड ऐकू येत होता.. शुद्ध स्वच्छ हवा,हॉटेल समोर राखलेली सुरेख हिरवळ आणि त्यात फुलांचा उत्सव मांडला होता..
" किती रे तुझे रंग, किती तुझ्या छाया,
दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया"
अशी अवस्था..


दमून भागून आलेलो, जेवणामुळे पोट जड झालेलं पण खोलीत जाऊन झोपायची इच्छा होईना..
बाहेर बागेत रेंगाळत बसलो..
थोडा वेळाने समोर नदीवर जाऊन भरपूर फोटो काढले..
थोडेसे ढग होते ते बाजूला सरले आणि समोर थेट बर्फ़ाचे शुभ्र डोंगर दर्शन देऊ लागले.. आहाहा.. अजूनही डोळ्यासमोरून चित्र जात नाहीये.
सगळी संध्याकाळ तिथे घालवून मग रात्री हॉटेल मध्ये जेवण करून बाहेर आलो तर पौर्णिमेचा चंद्र समोर दिसत होता..
एखादा दिवस किती सुंदर असावा..
हा दिवस दाखवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानत आणि उद्याची सुंदर स्वप्नं बघत मऊ दुलईत शिरलो..

Travel tips -
-- पहलगाम अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर ट्रिप प्लॅन करताना यासाठी किमान 2 दिवस जरूर बाजूला ठेवा.
-- आमचे हॉटेल मूळ पहलगाम गाव/मार्केट च्या 12-13 किमी अलीकडेच पायथ्याला होते. वर मार्केट आणि गावात खूप गर्दी आहे. त्यापेक्षा खाली जास्त सुंदर शांत वाटले.
--- क्रमशः
सकाळी जाग आली तर दूरवर पावसाचा आवाज येत होता.. 6.15 ला उठले तेव्हा बाहेर व्यवस्थित पाऊस.. गोंधळ क्रमांक 2.
मनात म्हणलं, झालं आता कल्याण.कसलं काय मिनी स्वित्झर्लंड न काय.बसा गुपचूप खोलीत टीव्ही बघत.
पण,
"अगर किसी चीज को आप शिद्दत से चाहो.. तो पूरी कायनात.. " वगैरे वगैरे.. असं खुद्द शाहरुख खानने आपल्याला सांगितलंय.. ते खरंच आहे बरं का.
8 वाजता जादू झाल्याप्रमाणे पाऊस बंद....
एकदम स्वच्छ निळं आकाश आणि सूर्य महाराज नोकरीवर हजर...
सोमवार होता त्यामुळे बहुतेक लेट आले साहेब.. Monday Blues काय फक्त आपल्या सामान्य माणसालाच व्हावेत की काय ? ते उन्ह बघून आमच्या गोटात एकदम आनंद पसरला आणि पटापट सगळं आवरून 6 मराठी वीर पहलगाम च्या घोड्यांवर बसायला तय्यार झालो.
वर पहलगाम चा घाट चढायला सुरू केले तसा रस्ता अधिकाधिक सुंदर होत होता. इनायत भाईंनी आज काय आणि कुठे फिरायचं, घोडे वाले किती पैसे घेतात, त्यांच्याशी कशी घासाघीस करायची अशा सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या.पोनी/घोडा स्टँड वर पोचून जमेल तितकं बर्गेनिंग स्किल वापरलं ( तुळशीबाग ट्रेनिंग कामी आलं ) आणि शिवाजीराजांचं नाव घेऊन आम्ही 6 जण घोड्यावर स्वार झालो.
"बैसरन" म्हणजेच मिनी स्वित्झर्लंड च्या दिशेने कूच केले.
प्रत्येकी 2 घोड्या सोबत 1 हेल्पर असे सोबत चालू लागले.या पहाडात राहणाऱ्या लोकांचा स्टॅमिना बघून आश्चर्य आणि लाज वाटते राव.पूर्ण 40-45 मिनिटांचा साधारण ५-6 किमी चा चढ असलेला डोंगर घोड्यांसोबत अगदी आरामात चढत होते ते लोक.आम्हाला घोड्यावर बसून घाम फुटला होता पण हे लोक अखंड गप्पा मारत चालत होते.
घोडा जरा डोंगराच्या टोकाला जायला लागला की आमची पाचावर धारण बसायची पण ते भाईलोक एकदम निवांत होते.
"अरे भाई इसको धरो, उसका पाय सटकेगा" भीतीमुळे हिंदी ची चिंधी होत होती.
"डरो मत दीदी, घोडेको भी उसकी जान प्यारी है" भाई एकदम निवांत.
माझ्या घोड्याचं नाव तर "सलमान".. त्याने भाईजान चे बरेच पिक्चर पण पाहिले असावेत.. सरळ चालायचं नावच घेत नव्हता भाऊ.. खड्डा दिसला की गेलाच तिकडे.
40 मिनिटे ही कसरत केल्यावर एक दगडी कमान आणि गेट दिसले.. तिकिटं काढून आत शिरलो आणि....आहाहा.. सगळ्यांच्या तोंडून एकदम उद्गार निघाला.
विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार पठार आणि त्याच्या चारही बाजूने बर्फ़ाचे डोंगर.हीच ती बैसरन व्हॅली उर्फ मिनी स्वित्झर्लंड.

लहान मुलांसारखे पळत सुटावेसे वाटत होते.किती फोटो काढु आणि किती नको असे झाले होते.
फोटो चा पहिला भर ओसरला.. मग जरा निवांत हिरवळीवर बसून आराम केला.नजर जाइल तिकडे लांबच्या लांब हिरवळीचा पट्टा दिसत होता.गरजेपुरते उन्ह आणि थंड अल्हाददायक हवा असे एकदम "मौसम का जादु है मितवा" वातावरण.
इतक्यात तिथे काश्मीरी कपड्याचे स्टॉल दिसले.समस्त महिला वर्गाने "काश्मीर च्या कळ्या(?)" बनून मनसोक्त फोटो काढले.
पुरुष वर्गाला तसले कपडे न आवडल्याने नवर्याने स्वतःचे असे फोटो काढायला नकार दिला. ( शेजारीच एक काकु आणि काकांचे या विषयावर भांडण चालू होते.. काकांना अजिबात न आवडलेले कपडे त्यांनी घालावे म्हणून काकु मागे लागल्या होत्या.मी नवर्या कडे परत एकदा बघितले तर त्याच्या डोळ्यात काकांबद्दल सहानुभूती आणि काकुंबद्दल राग दिसला
मग तसला सीन रिपीट होऊ नये म्हणून मी पण गप्प बसले)रंगीत अल्युमिनियम टमरेल cum मटका, खोट्या फुलांचा फ्लॉवरपॉट यासोबतच ससे, मेंढ्या असे जिवंत props हातात घेऊन आम्ही मनसोक्त फोटो काढले.. ( एकदा वेडेपणा करायचा ठरवला की पुरेपूर करावा नाही का.)
मग अचानक आलेल्या मॅगी आणि भजी च्या वासाने भुका लागल्यावर पोटपुजा करयला बसलो. अशा ठिकाणी मॅगी आणि भजी खायला फारच मजा येते.सोबत आमचा पण थोडा लाडु, वड्या असा खाउ होता. आमच्या सोबत आलेल्या घोडेवाल्या दादांना तो घरचा खाउ ऑफर केला तेव्हा त्यांनी सांगितले की "मीठा खानेसे पहाडोमे चलना मुश्किल होता है तो हम लोग बिलकुल मीठा नही खाते" त्यांचे उत्तर ऐकुन त्यांच्या तबियत चा राज लक्षात आला आणि पुढचा लाडु चा तुकडा तोंडात टाकयला लाज वाटु लागली. अखेर त्या सुंदर ठीकाणाला नाईलाजाने निरोप देउन खाली
उतरायला सुरु केले.उतरताना अजून जास्त मजा ( आमची मजा आणि घोडेवाल्यांची करमणूक ) करत खाली पोचलो.
त्या घोड्यावर तोल सांभाळत बसायचं, शिवाय ढाल तलवार हातात धरायची आणि शत्रूला कापायचा ते पण अवघड अशा दऱ्याखोऱ्यात. इतके उद्योग महाराज आणि मावळे कसे करत असतील या विचाराने मनोमन एकदा शिवरायांना मुजरा घातला.
पहलगाम मार्केट मध्ये एका बऱ्या हॉटेल मध्ये जेवण करून थोडीफार शॉपिंग केली ***.
आता पुढचे ठिकाण होते "बेताब व्हॅली" आणि "अरु व्हॅली"
इथे जाण्यासाठी लोकल टॅक्सी करावी लागते ती इनायत भाईंनी बघून दिली आणि बेताब ला निघालो.टॅक्सी वाला फॉर्म्युला 1 रेस चा चाहता होता त्यामुळे भयानक वेगात "बेताब" होऊन गाडी चालवत होता.तिथे पोचलो तर भयंकर ट्राफिक जाम.गाडीतून उतरून चालत चालत उतार उतरून खाली व्हॅली पर्यंत जावे लागले ( ट्रॅफिक जॅम नसता तर खालपर्यंत गाडी जाते) आणि तिथेच सगळा स्टॅमिना खलास झाला.
बेताब व्हॅली म्हणजे लीडर नदी जवळ पसरलेली एक सुरेख बाग आहे. तिथे छोटे छोटे पूल आहेत, गझिबो आहेत, एक छोटा तलाव आहे, 2-3 गोड दिसणारी उतरत्या छपराची घरं आहेत,भरपूर फुलं आहेत.

बेताब या हिंदी सिनेमा चं शूटिंग झालेलं ठिकाण म्हणून नाव बेताब व्हॅली.
तिथे पोचेपर्यंत बरेच चालावे लागल्यामुळे , आत गेल्यावर हिरवळीवर लोळायला सुरू केले. पूर्ण व्हॅली बघायला 1-2 तास नक्कीच पुरणार नाहीत.. एक पूर्ण दिवस सुद्धा कमीच पडेल.पण इतका वेळ आमच्या कडे नव्हता त्यामुळे जेवढं दिसलं त्यावर समाधान मानून तिथून बाहेर पडलो आणि काय..
गोंधळ क्रमांक 3
माननीय टॅक्सी चालकाने वर रस्त्यावर जिथे सोडले होते तिथे हाशहुश करत पोचलो तर महाराज गायब.त्याचा नंबर पण नाही जवळ.खरतर गाडीतुन उतरलो तेव्हा त्याला नंबर मागितला होता पण "मै यही रहुंगा दिदी, आप गाडी नंबर प्लेट का फोटो लेलो" असे म्हणत स्वतःचा फोन नंबर जसा काही व्हीआयपी आहे अशा थाटात त्याने दिलाच नाही. तो तिथेच असेल मग कशाला नंबर लागेल असे म्हणुन आम्ही पण फार आग्रह केला नाही. आता अवघड झालं होतं. मग इनायत भाईंना फोन केला तर ते म्हणाले की हा माणुस पहलगाम टॅक्सी युनियन चा आहे आणि त्यांच्याकडे पण त्याचा नंबर नाही. मग गाडी नंबर इनायत भाईंना पाठवला त्यावरुन टॅक्सी युनियन च्या ऑफिस मधे जाउन त्या माणसाचा फोन नंबर मिळवला आणि अखेर त्याच्याशी संपर्क केला तर ट्रॅफिक क्लिअर झाले म्हणून साहेब सगळा उतार उतरून खाली जाऊन आमची वाट बघत बसले होते आणि आम्ही तोच सगळा चढ चढून वर येऊन त्यांची वाट बघत बसलो..
असो. बडे बडे देशो मे छोटी छोटी गलतिया होती है ना.. ( रा. रा. शाहरुख खान परत एकदा .. बघा किती तत्वज्ञान असतं भारतीय सिनेमात..आणि लोक उगीच सिनेमाला नावं ठेवतात..)
मग जरा गरमागरमी झाली, आता थेट रूम वर जाऊ वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या.पण पहलगाम च्या गार हवेने लगेच लोक शांत झाले आणि अरु व्हॅली ला एक चक्कर मारून येऊ असे ठरले.
अरु व्हॅली चा रस्ता म्हणजे रस्ताच होता.एकावेळी जेमतेम दोन लहान गाड्या जाऊ शकतील असा थोडा अरुंद रस्ता.एकीकडे डोंगर, दुसरीकडे दरी आणि त्यातून वाहणारी लीडर.पाईन ची झाडं, हिरवेगार डोंगर, मधून वाहणारे धबधबे, छोटी छोटी मातीची घरं,चरायला सोडलेल्या मेंढ्या, घोडे...नितांतसुंदर निसर्ग....

त्या रस्त्यावरून अरु व्हॅली पर्यंत जाऊन परत येणे हा प्रवास अप्रतिम होता.. पण परत तेच.. वेळ कमी पडला त्यामुळे अरु व्हॅली ला जास्त वेळ थांबता आले नाही.
आमच्या फॉर्म्युला 1 टॅक्सी वाल्याने सुखरूप पहलगाम टॅक्सी स्टँड ला आणले आणि इनायत भाईंच्या हाती सोपवले एकदाचे.
सुंदर आणि थकवणारा दिवस संपला होता..
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन आणि अप्रतिम जेवण ( तिथं खाल्ली तशी फ्लॉवर ची भाजी मी आजवरच्या आयुष्यात कधीच खाल्ली नाहीये) जेऊन अंथरुणावर पाठ टेकली तरी घोड्यावर बसल्यासारखे वाटत होते.
***Travel tips -
-- काश्मीर स्पेशल खरेदीसाठी पहलगाम अतिशय स्वस्त आहे. पुढे श्रीनगर मध्ये बघू वगैरे अजिबात विचार न करता व्यवस्थित खरेदी करा.
"इधर डुप्लिकेट माल मिळता है याहा मत लो दीदी, मै आगे श्रीनगर मे आपको फॅक्टरी मे लेके जाता हु" असे कोणीही कितीही म्हणाले तरी कोणाचंही ऐकू नका.. बिनधास्त खरेदी करा.
-- मार्केट मध्ये पॅराडाइज हॉटेल च्या शेजारी गल्ली मध्ये सुंदर शाली,स्टोल आणि स्वेटर मिळाले. तेच पुढे श्रीनगर ला दुप्पट तिप्पट दरात होते.
-- क्रमशः
17 मे 2022
रात्रभर अरु, बेताब, बैसरन व्हॅली ची स्वप्नं बघत बघत मस्त झोप झाली.
सकाळी 5.30 लाच बाहेर लख्ख उजाडलं होतं. पटकन आवरून परत एकदा बाहेर नदीवर
जाऊन आले. पहलगाम ला आज निरोप द्यायचा होता. परत एकदा लीडर नदी चा खळखळाट
कानात साठवून घेतला. भरपूर शुद्ध हवा छातीत भरून घेतली. रूम वर येऊन पटापट
आवरून चेकआउट करून निघालो.
आजचा मुक्काम होता.. दल लेक, श्रीनगर.
पहालगाम ते श्रीनगर चा सुंदर रस्ता परत सुरू झाला. परत एकदा सगळं चित्र
डोळ्यात साठवून घेतलं.वाटेत ओळीने सफरचंदाच्या बागा लागायला सुरुवात झाली
होती.सध्या सिझन नाही पण तरी छोटी छोटी हिरवी सफरचंद लागली होती
झाडांना.एका बागेपाशी गाडी थांबवली.
बाहेर सफरचंदाचा ताजा ज्यूस आणि इतर बरेच प्रॉडक्ट्स विक्री चालू होती.आत बागेत एक फेरफटका मारला..
पहिल्याच झाडाला 3-4 छोटीशी थोडी लालसर सफरचंदे लटकली होती. पुढे जाऊन सगळी
बाग पहिली. सगळ्या झाडांना लहान लहान हिरवी सफरचंद लागली होती. अगदी
आपल्या पेरू सारखी दिसत होती.पहिल्याच झाडाला लाल सफरचंद कशी काय बुवा
म्हणून मागे येऊन बघतो तर तारेने बेमालूम पणे झाडाला बांधलेली ती सफरचंदे
बघून हासू आवरेना.मार्केटिंग गिमिक्स साठी काय काय करतील लोक.
धन्यवादच.आम्ही आपले त्या सफरचंदासोबत मस्त फोटो बिटो काढून घेतले होते.
पण काही का असेना.निदान झाडाला आलेली सफरचंदे कशी दिसत असतील याचा अंदाज आला.

बाहेर चवीला म्हणून 1 ग्लास सफारचंदांचा ताजा ज्यूस घेतला तर मस्त गोड होता.तिथे मग मनसोक्त ताजा ज्यूस प्यायला. सोबत सफरचंदाचे लोणचे, चटणी, जॅम, सॉस अशा अनेक गोष्टी चव घेऊन पाहिल्या.सर्व वस्तू अप्रतिम चवदार. Apple cyder vinegar पण मस्तच होते. भरपूर खरेदी करून तिथून निघालो.
पुढचे ठिकाण होते "मार्तंड सूर्य मंदिर"
आमच्या itinerary मध्ये नसलेले हे ठिकाण, पण इनायत भाईंनी आग्रह करून
आम्हाला इथे नेले. तुम्हाला खूप आवडेल असे म्हणत वाटेतले हे एक अनवट
,टुरिस्ट लोकांना फारसे नाहीत नसलेले हे एक सुंदर मंदिर आहे.शेजारी एक
गुरुद्वारा सुद्धा आहे.
शंकर पार्वती, गणपती अशी छोटी छोटी मंदिरे आणि पूर्वी कधीच ना बघितलेले असे
सूर्याचे मंदिर इथे आहे. समोर मोठा चौकोनी तलाव आणि त्यात भरपूर मासे.
शांत स्वच्छ असा परिसर आहे हा.खुप प्रसन्न वाटले तिथे.
तिथून पुढचे ठिकाण होते "अवंतीपुरा मंदिर"
अनंतनाग जिल्ह्यातील अतिशय सुंदर असे हे ठिकाण.
अवंतीवर्मन राजा ने 9 व्या शतकात झेलम नदीच्या काठी बांधलेल्या विष्णु
मंदिराचे हे अवशेष आहेत. संपूर्ण दगडातील हे मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना
आहे. आम्ही पोचलो तेव्हा भर दुपार होती पण तरी मंदिराच्या आवरातली बाग,
आजूबाजूचे डोंगर आणि झाडांमुळे मस्त गार वारा येत होता.
काश्मीर ची हीच मजा आहे. वर डोक्यावर कितीही उन्ह असुदेत, अजिबात गरमी होत नाही. हवा सतत थंड, आल्हाददायक असते.
या ठिकाणी सुप्रसिद्ध आंधी चित्रपटातील "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो
नाही" या गाण्याचे शूटिंग झाले होते.मग आमच्या "संजीव कुमार" सोबत तिथे
जोरदार फोटोसेशन आणि व्हिडीओ शूटिंग करून घेतले. सोडते का काय 



या मन्दिराच्या आवारात मोठे मोठी चिनार वृक्ष होते. चिनार ची झाडे आणि पाने सुद्धा खुप सुन्दर दिसतात. त्या झाडाच्या खाली मोठे मोठे पार बांधलेले आहेत.एकंदरीत मंदिर छान राखलेले आहे.
पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे "केशर खरेदी".पहालगाम ला जाताना
केशराची शेते पाहिली होती तिथेच पम्पोर गावाजवळ केशराची दुकाने आहेत.केशर,
अक्रोड, मामरा बदाम, केशरचे क्रीम, केशर चा स्क्रब, अत्तर, कहावा असे अनेक
उत्तम प्रकार तिथे होते. खास काश्मिरी लाल मिरची आणि आपल्या कोल्हापुरी
कांदा लसुण मसाल्यासारखा काश्मिरी मसाला सुद्धा होता तिथे. अनेक प्रकारचे
सुके मेवे असेच चवीसाठी म्हणून तिथे ठेवले होते आणि आम्हाला उत्तम असा
कहावा तिथे प्यायला मिळाला.तिथे मनसोक्त खरेदी केली. त्या दुकानातून
घेतलेले क्रीम आणि स्क्रब खरच खूप अप्रतिम आहे. आणि केशर सुद्धा उत्तम
निघाले. इथे खिसा फारच हलका झाला. काश्मीर मध्ये कितीही ठरवलं तरी खरेदीचा
मोह टाळूच शकत नाही. 
आता मात्र मंडळी दमली आणि गाडी थेट श्रीनगर च्या दिशेने धावू लागली.
आज चे लंच जरा खास होते. प्रसिद्ध "काश्मिरी वाझवान" चाखायला जायचे होते आज.
श्रीनगर मधील त्यासाठी खास असलेल्या "मुघल दरबार" या हॉटेल बद्दल नेट वर
वाचले होते आणि इनायत भाईंनी पण तेच हॉटेल सुचवले.तिथे दुपारी पोचलो.वाझवान
म्हणजे काश्मिरी मेजवानी. काश्मीर मध्ये लग्न समारंभात खास आचारी बोलावून
हे बनवले जाते.
तिथले लोक पक्के भातखाऊ.त्यामुळे भात आणि वेगवेगळे मांसाचे प्रकार म्हणजेच
रोगनजोश, तबकमाझ, रीस्ता,गुश्टाबा, कबाब अशा भारीपैकी नावांचे वेगवेगळे
रस्से म्हणजे वाझवान.
मटन मी फारसे कधी खात नाही पण बाहेर पडले की लोकल डिश खाऊन बघायला हवी असे
आम्हाला वाटते म्हणून चवीसाठी खाऊन पाहिले. ठीकच होते. मला विशेष आवडले
नाही. कदाचित टेस्ट डेव्हलप व्हायला हवी.आजूबाजूचे लोक ज्या उत्साहाने खात
होते त्यानुसार ते चांगलेच असणार.
भरपेट खाऊन आता डोळ्यावर झोप यायला लागली होती.. 3.30 वाजून गेले
होते..थोडी पावसाची भुरभुर सुरू झाली होती.. हवा जरा अजूनच गार झाली
होती.आता थेट हाऊसबोट वर जाऊन जरा आराम करू म्हणून थेट दल गेट No 8 ला
पोचलो.
समोर दिसत होती आमची हाऊसबोट.....The Royal Sovereign...
दल लेक जवळ पोचलो आणि एकदम वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटलं..
आमच्यासाठी शिकारा तयार होता.. त्यात बॅग्स चढवल्या, आम्ही पण चढलो आणि
आमच्या हाऊसबोट कडे निघालो.. मस्त गार वारा येत होता. ढग आल्यामुळे उन्ह
गायब झालं होतं. 5 मिनिटात आमच्या हाऊसबोट मध्ये पोचलो सुद्धा. तिथल्या
गुलजार भाईंनी छानपैकी हसून स्वागत केलं..
आमच्या तरंगत्या राजेशाही घरात आम्ही प्रवेश केला.किती सुंदर सजवली होती ती
हाऊसबोट.संपूर्ण लाकडात बनवलेली, उंची पडदे, गालिचे, झुंबर, शिसवी मोठे
नक्षीदार डायनिंग टेबल आणि 4 बेडरूम्स. तरंगता महालच.
बाहेर डेक वरच बसून राहवेसे वाटत होते. शिकारे येत जात होते.. हलका पाऊस सुरू झालेला.
झोपायचा बेत रजईत गुंडाळला आणि पुढच्या एक तासात आमच्या शिकारा राईड साठी आम्ही बाहेर पडलो सुदधा.
पाऊस आता थांबला होता पण अजून हवा ढगाळ होती. दल लेक ची आणि तिथल्या
तरंगत्या मार्केट ची सफर करायला आम्ही शिकारा मध्ये स्थानापन्न
झालो.गाद्या, उशा, पडदे असलेल्या त्या शिकारामध्ये मस्त पाय पसरून
बसलो.शिकारावाला अखंड बडबड करत लेक बद्दल सांगत होता.थोडं पुढे गेलो तर परत
मस्त पाऊस सुरू झाला आणि आता चांगलीच थंडी वाजायला लागली. दल च्या
मध्यभागी एक तरंगते हॉटेल होते. तिथे स्टॉप घेऊन गरम मॅगी आणि भजी चहा
ऑर्डर केली. शिकारा मध्ये बसून बाहेर चा पाऊस बघत भजी खाणं म्हणजे सुख.
पुढे जाऊन तरंगणारी शेती बघितली, मीनाबाजार म्हणून दल मध्ये मार्केट
आहे.तिथे एक चक्कर मारून आलो. पण मुलखाचा महाग. वाटेत शिकारा चे ट्रॅफिक
जॅम पण पाहिले. हा हा हा.
परत येता येता पाऊस थांबला, जोरदार वारा सुटला आणि समोरचे सगळे ढग बाजूला सरले. आता समोर थेट दिसत होते गुलमर्ग चे बर्फ़ाचे डोंगर.
आत्ता लिहिता लिहिता सुद्धा ते दृश्य आठवून काटा आला अंगावर. काश्मीर ला
किती प्रकारचं सौंदर्य लाभलंय.पहलगाम मधून दिसणारे बर्फ़ाचे डोंगर आणि आत्ता
दल लेक मधून दिसणारे डोंगर यात किती तरी वेगळेपण होतं.दोन्ही तितकंच
सुंदर. तुलनाच करता येणार नाही.
शरीर आणि मन दोन्ही तरंगतच परत बोट वर आलो.
घरगुती गरम जेवण जेऊन दुलई मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही.
-- क्रमशः
18 मे 2022
पहाटे 5.15 च्या दरम्यान अजान च्या आवाजाने जाग आली.लख्ख उजाडलं होतं. थोडा
वेळ गादी मध्ये लोळून घालवला पण आता झोप लागेना. लगेच बाहेर डेक वर धाव
घेतली.( खरंतर डेक म्हणणं अगदीच अरसिक वाटेल.. सज्जा हा जास्त सुंदर शब्द
आहे.. लाकडी कमानी असलेला आणि बसायला गाद्या असलेला असा हा सज्जा होता )
सज्जा
राजेशाही हाउसबोट
दल चं पहाटेच सौंदर्य अजूनच खुललं होतं. काल पर्यटकांचे शिकारे फिरत होते.
आज दिसणारे शिकारे वेगळेच होते. भाजी विक्रेते, फुलं विक्रेते, दैनंदिन
गरजेच्या वस्तू जसं की पेस्ट, साबण, ब्रश ई विकणारे असे शिकारे फिरत होते.
ताजी फुलं घेऊन जाणारा शिकारा अप्रतिम दिसत होता. शाळेत जाणारी मुलं
युनिफॉर्म घालून शिकारा मध्ये बसून किनाऱ्यावर जात होती. त्यांच्या आया
शिकारा चालवत त्यांना सोडायला निघाल्या होत्या. हे सगळं वेगळच जग होतं.
फुलांचा शिकारा
शिकारा मधे बसुन शाळेत...
काश्मिरी भाषेमध्ये दल म्हणजेच तलाव.त्यामुळे दल लेक म्हणणं खरंतर चुकीचं. पण आता सगळेच जण तेच म्हणतात.
दल म्हणजे 22 square km पसरलेलं एक तरंगत शहर. इथे 1 लाख लोक
राहतात.त्यांचे सगळे दैनंदिन व्यवहार शिकाऱ्यामधून चालतात. शाळेत,नोकरीला
येणे जाणे, किराणा,भाजीपाला खरेदी सगळं शिकाऱ्यावरून.आम्ही तर एक
भांडीकुंडी विकणारा शिकारा पण बघितला. 
बोटीच्या सज्जा वरून समोर शंकराचार्य टेकडी आणि मंदिर दिसत होतं. 6.30 नंतर
तिथुन पूजा आणि मंत्रोच्चार ऐकू येऊ लागले. सूर्योदयाची सुंदर वेळ आणि ते
मंत्र असं एकदम भारलेलं वातावरण होतं ते.
हळू हळू आजूबाजूचे लोक जागे झाले.चहा चे राउंडस झाले आणि फिरते विक्रेते
आपल्या पोतड्या घेऊन बोटीवर दाखल होऊ लागले.ही एक बेस्ट सिस्टीम होती.
शाल,ड्रेस मटेरियल, स्टोल, इमिटेशन ज्वेलरी, केसर, ड्रायफ्रूटस विकणारे असे
सगळे लोक एक एक करून आपल्या हाऊसबोट वर येतात. आपण निवांत मांडी ठोकून
बसायचं, त्यांच्या वस्तू बघायच्या, दर जमला, पटला तर ठीक नाहीतर सोडून
द्यायचं. फिरते शॉपिंग.आम्ही पण थोडीफार खरेदी करून त्यांना नाराज केले
नाही.;-)
आजचा दिवस होता श्रीनगर दर्शन.
आज निवांत उठणे, खरेदी या सगळ्या मुळे बाहेर पडायला उशीर झाला त्यामुळे
शंकराचार्य टेकडी 4 नंतर करू असे ठरवून आम्ही आधी आमचा मोर्चा बागांकडे
वळवला. आधी पोचलो बोटॅनिकल गार्डन ला.विस्तीर्ण तलाव, त्यात जागोजागी
कारंजे, सुंदर राखलेली हिरवळ आणि फुलच फुलं.लहान मुलांच्या शाळेची ट्रिप
आलेली बागेत. ती गोरी गोबरी गोंडस मुलं आणि त्यासोबत फ़ुलं अशी डोळ्यांना
एकदम मेजवानी बघायला मिळाली.

तिथून बाहेर पडून पोचलो "निशांत बाग" ला.दल च्या समोरच्या डोंगरावर वेगवेगळ्या लेव्हल्स वर पसरलेली, प्रचंड मोठी अशी ही बाग.
जिथे नजर जाईल तिथे हिरवळ, मोठे वृक्ष, फुलांचे ताटवे, आणि बागेच्या
मध्यातून पाणी खेळवलेले आहे. ही बाग इतकी मोठी आहे की ती पूर्ण फिरून
बघायला एक अख्ख्या दिवस जाईल. बागेतून दल चा सुंदर नजारा दिसतो.इथे पण
काश्मिरी ड्रेस घालून फोटो काढून देणाऱ्यांची फौज होती. पहलगाम मध्ये ड्रेस
न आवडल्याने नवऱ्याने फोटो काढून घेतले नव्हते. इथले पुरुषांचे कपडे जरा
वेगळे होते त्यामुळे आमच्या साहेबाना फोटो काढायला उत्साह आला. पटापट कपडे
बदलून फोटोग्राफर समोर उभे राहिलो. त्याने अगम्य अशा पोझेस मध्ये दाणादण
फोटो काढायला सुरुवात केली.आम्ही आपले पब्लिक बघून जरा लाजत होतो तर हा
"आपकी ही बीबी है ना, या दुसरे की लेके आये है" असा टिपिकल डायलॉग टाकून
मोकळा.आम्ही आपले 1-2 फोटो काढणार होतो पण हा बाबाजी थांबायला तयारच
नव्हता. अखेर त्याचं मन आणि खिसा पुरेपूर भरेल अशी खात्री झाल्यावर तो
थांबला. त्या फोटोचा अलबम आमच्या लग्नाच्या अलबम पेक्षा मोठा झालाय.;-);-)
तिथून बाहेर पडून झटपट जेवण केले आणि पुढच्या बागेत गेलो. "चष्मेशाही गार्डन"
एका टेकडीच्या पायथ्याशी असलेली ही अजून एक सुंदर बाग. साधारण निशांत बाग
च्या पद्धतीचीच.. भरपूर फुलांचे ताटवे. इथे जरा कमी गर्दी होती.जेवण
झाल्यामुळे पोट जड झालं होतं. आणि आता कडक उन्ह पडलं होतं. गेले २-३ दिवसात
हिवाळा,पावसाळा आणि आता उन्हाळा असे सगळे सिझन पाहुन झाले होते
एका चिनार च्या दाट सावलीत सरळ आडवे झालो. आजूबाजूचा सुंदर नजारा, इकडे
तिकडे पळणारी लहान मुले, बागेचे,घरच्यांचे फोटो घेणारे हौशी फोटोग्राफर अशी
गंमत बघत १-१.५ तास मस्त वेळ गेला. आता ४ वाजत आले होते.सकाळपासून फिरून
फिरून पाय दुखायला लागले होते. अजून काही बागा आणि शंकराचार्य मंदीर पहायचे
बाकी होते पण आता कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. तसही ही ट्रीप आम्ही आमच्या
मर्जी प्रमाणे आरामात करायची ठरवली होती. त्यामुळे इनायत भाईंना गाडी सरळ
हाऊसबोट कडे घ्यायला सांगितली. बोट वर जाऊन मस्त १-१.५ तास आराम केला.
संध्याकाळी उठुन फ्रेश होउन 7 च्या दरम्यान दल लेक समोर च्या रोड वर एक
फेरफटका मारला. हा दल रोड फार मस्त आहे.श्रीनगर मधला सर्वात गर्दीचा असा हा
रस्ता असावा कारण आम्ही जे 2 दिवस तिथे होतो तोवर सकाळी 10 ते थेट रात्री 9
पर्यंत इथे कायम ट्रॅफिक जाम असायचे.या रोड वर खुप सारे हॉटेल्स्,काश्मीर
स्पेशल शॉपिंग साठी दुकाने आहेत. लांबच्या लांब फुटपाथ आहे. त्या फुटपाथवर
कपडे, खेळणी ई विकणारे लोक होते. तिथे अक्रोड आणि पाईन च्या लाकडापासून
बनलेल्या वस्तू विकणारे काही विक्रेते होते. त्यांच्याकडे थोडी किरकोळ
खरेदी केली.इथे सुद्धा परत एकदा खुप स्वस्त अशा शाली आणि ड्रेस मटेरीअल
मिळाले. दुकानातल्या आणि रस्त्यावर मिळणार्या सेम क्वालिटीच्या वस्तुंच्या
किमतीमधे बराच फरक होता. त्यामुळे परत एकदा मोह झाला आणि अजुन थोडी खरेदी
झाली. अंधार पडला की तिथुन पाण्यातल्या सगळ्या ओळीने लागलेल्या हाउसबोटस चे
लाईट्स आणि त्याचे पाण्यातले प्रतिबिंब सुन्दर दिसते. लेक वरुन मस्त वारा
वाहात असतो. तिथे चक्कर मारायला खुप मजा आली.
इथे भेळ, पाणीपुरी,मोमो, आईस्कीम असे ठेले होते. अप्रतिम मोमो खायला मिळाले
आम्हाला. काश्मीर ची पाणीपुरी खायचं तेवढं धाडस झालं नाही.;-)
आता परत जाऊन जरा लवकर झोपू असे ठरवले इतक्यात आम्हाला एक ओळखीचा बोर्ड दिसला.."सुखो थाई" हे एकदम अनपेक्षित होतं.
आपसूक पावलं आत शिरली. 30 मिनिटांचा मस्त थाई फूट मसाज करून घेतला.आणि अक्षरशः तरंगतच परत आलो.
आणि हो.. अजून एक असेच अचानक सापडलेले ठिकाण म्हणजे दल लेक घाट #9 समोरची
एक फ्रेंच बेकरी.आता नाव विसरले मी.तिथे रेड वेलव्हेट, फ्रेश फ्रुट अशा
अप्रतिम चवीच्या पेस्ट्री मिळाल्या.परत येऊन गुलजार भाईंनी बनवलेली चवदार
काश्मिरी बिर्याणी,रायता आणि वर पेस्ट्री खाऊन आजचा दिवस संपला. उद्याची
स्वप्नं बघत अंथरुणात शिरलो..
उद्याचं ठिकाण होतं.. गुलमर्ग.. बर्फ..
ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला होता.
-- क्रमशः
१९ मे २०२२
"गुलमर्ग ला जायला पहाटे 6 वाजता निघा."
"सकाळी 8:30 च्या आत तिथे पोचा"
असे बरेच जणांनी आधीच सांगितले होते पण आमच्या इनायत भाईंना विचारलं तर ते
म्हणाले,काही गरज नाही, तिथे आपला गाईड असतो, तो लाईन मध्ये नंबर लावून
देतो. आपण 8.30 वाजता निघू.त्याच दिवशी हाऊसबोट वरून चेकआउट करून आम्हाला
श्रीनगर मधेच दुसऱ्या एका हॉटेल मध्ये शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे आम्ही
सकाळी 7.30 लाच निघायचे ठरवले.म्हणजे नवीन हॉटेल वर बॅग्स टाकून पुढे निघता
येईल अशा अंदाजाने. पण आमचे वेळेच्या बाबतीतले जुने रेकॉर्ड लक्षात घेता
आम्ही काही सकाळी 7.30 ला तयार होऊ शकणार नाही अशी इनायत भाईंना पक्की
खात्री असावी.त्यामुळे ते नेमके त्या दिवशी उशीरा आले.पण बर्फ हा शब्दच
जादुई असल्याने तमाम जनता खरोखरच 7.30 ला तय्यार होती.मग वाट बघण्यात 1 तास
गेला. शेवटी सामान तसेच गाडीच्या टपावर घेऊन 8.30 ला आम्ही श्रीनगर सोडले.
वाटेत टंगमर्ग जवळ आमचा दुसरा गाईड (जो गुलमर्ग मध्ये आमच्या सोबत असणार
होता) आम्हाला भेटला.त्याचे नाव मसरूफ भाई.त्याच्या सांगण्यानुसार तिथेच
एका दुकानात बर्फात घालायचे गम बूट,जॅकेट ई घेतले. आणि गुलमर्ग ला 10 ला
पोचलो.गुलमर्ग वाहनतळ ते केबल कार स्टेशन 2 km अंतर आहे. तिथे जायला
घोड्याचा पर्याय होता. गेले दोन-तीन दिवस रोज भरपुर चालत होतो त्यामुळे
आधीच पाय दुखत होते त्यामुळे आणि वरती बर्फात खेळायला उत्साह टिकून राहावा
म्हणून आम्ही घोड्याने जायचे ठरवले. केबल कार स्टेशन जवळ जायला अजून अर्धा
तास गेला. अखेर 10:45 ला लाईन मध्ये उभे राहिलो.
जय जय शिवशंकर गाण्यात दिसणारं देउळ
पूर्वी ही केबल कार ची तिकिटे तिकडे जाऊनच काढावी लागत आणि त्यासाठी हे
लोकल गाईड कम agent असायचे पण आता ऑनलाइन तिकिटे मिळतात. ही तिकिटांची लाईन
म्हणजे मारुतीची शेपटीच होती.गाईड च्या म्हणण्यानुसार ऑनलाइन पद्धतीत
जास्त तिकिटे विकली जात आहेत आणि त्यामुळे जास्त गर्दी होते. थेट विक्री ला
लिमिटेड तिकिटे असायची आणि त्यामुळे कमी गर्दी आणि कमी लाईन असायची. काय
कोण जाणे पण भयंकर मोठी लाईन बघून आपला नंबर कधी येणार असे झाले पण आमच्या
गाईड ने योग्य जागी आधीच नंबर लावून आम्हाला शक्य तितक्या पुढे पर्यंत
नेले. तरीही 2 तास लागलेच. 
लांबच लांब लाईन, समोरच्या इमारती मधे २ मजले भरुन लाईन होती 

गुलमर्ग केबल कार च्या दोन फेजेस आहेत.त्यातल्या दुसऱ्या फेज वर म्हणजे
अफारवत पर्वतावर बर्फ आहे. पहिली फेज पण अतिशय सुंदर आहे. दूरवर पसरलेली
हिरवी कुरणे आणि चाहुबाजूने बर्फ़ाचे डोंगर. आम्ही पहिल्या फेज साठीच्या
च्या रांगेत उभे होतो. जवळजवळ 2 तासाने केबल कार जवळ पोचलो. आता ५ मिनिटात
पहिल्या फेज च्या केबल कार मध्ये बसणार आणि मग वर जाऊन लगेच दुसऱ्या फेज ची
केबल कार. की लगेच बर्फ..इतक्यात..
"महा"गोंधळ क्रमांक 4..
"कृपया ध्यान दिजीए, उपर मौसम खराब होने के कारण फेज २ केबल कार पुरे दिन के लिये बंद कर दिया है. असुविधा के लिये खेद है "
एका क्षणात सर्वांचे मूड बदलले.डोळे भरून आले.ज्यासाठी इतका अट्टाहास केला
ती गोष्ट अशी समोर दिसत असताना निसटून चालली होती. आमचं एकवेळ जाऊदे पण
आमच्या लेकीला बर्फ दाखवायचाच होता. ती तर किती नाराज होईल. खूप खूप वाईट
वाटायला लागलं. आता पहिल्या फेज पर्यंत तरी कशाला जा.चला इथूनच जाऊ परत असे
विचार मनात यायला लागले. मसरूफ भाई म्हणाले वर जाऊन तर बघू काही होतं का.
मौसम ठीक झाला तर 1 तासाने सुरू होईल परत.आशा ही चिवट गोष्ट आहे. स्वामींचं
नाव घेतलं.मनात म्हणलं,"महाराज, बाकी काही असो , आज माझ्या लेकीला बर्फ
दिसलाच पाहिजे."
केबल कार ला इथे गंडोला म्हणतात. पहिल्या फेज च्या गंडोला मध्ये बसलो
आणि आजूबाजूचा निसर्ग बघून मघाशी मनात आलेले सगळे विचार पळून गेले.
निसर्गात किती ताकद असते ना.सगळ्या नकारात्मक भावना आपोआप निघून जातात.
गंडोला मधुन दिसणारी ही माती आणि कुडाची बसकी घरे. यांना काहितरी खास नाव आहे पण मी आता ते विसरले.
गुलमर्ग बेस पासून 10 मिनिटात पहिल्या फेज वर पोचलो. समोरच वरती अफारवत
पर्वत आणि बर्फ दिसत होता. तिथेच आम्हाला जायचे होते. पण डोंगरावर खरच खूप
दाट काळे ढग आले होते आणि तिथे खूप जास्त वारा होता. फेज 2 गंडोला सुरू
व्हायची शक्यता धूसर होती तरी पोचताक्षणी फेज 2 च्या स्टेशन कडे धाव घेतली.
पण केबल कार आज सुरू होणार नव्हती हे पक्के होते.
आता काय ? कसा बघणार बर्फ ?
पण जेव्हा इच्छा प्रबळ असते तेव्हा मार्ग निघतोच.दूर डोंगरात ग्लेशियर
सारखी जागा दिसत होती. तिथे भरपूर बर्फ दिसत होता.बरेच घोडावाले पर्यटकांना
घेउन त्या दिशेला चालले होते.मसरूफ भाईंनी सांगितलं की तिथे बर्फ़ापर्यंत
जाता येतं पण 30-40 मिनिटे घोड्यावरून जावे लागेल. त्या सेकंदात कुठलाही
विचार न करता हो म्हणून मोकळे झालो.खरंतर पहलगाम ला सुमारे २-३ तास सलग
घोड्यावर बसून आधीच मांड्या आणि पाय दुखत होते आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस
भरपूर चालून झाले होते त्यामुळे आता घोडा नको वाटत होता पण बर्फ बघण्यासाठी
अजून थोडे कष्ट करायलाच हवे होते.पुढच्या पाचव्या मिनिटात आम्ही घोड्यावर
बसून वरती जायला निघालो होतो.
पहलगाम चा चढ आणि डोंगर सोपा म्हणायची वेळ त्या रस्त्याने आणली.व्यावस्थित
चढ आणि काही ठीकाणी एकदम इतका छोटा रस्ता की कसे बसे २ घोडे जाउ
शकतील.समोरुन परत येणारे घोडे आणि जाणारे घोडे यांची टक्कर व्हायचे फुल
चान्सेस.खुप वृद्ध आणि खुप लहान मुले असलेले आई बाबा असे बरेच परस्पर
विरोधी लोक वाटते घोड्यावरुन जाताना दिसत होते त्यांची दया येत होती.( आणि
मनात कुठेतरी असे पण वाटत होते की का अट्टाहास करत असतील हे लोक झेपत
नसताना) एका म्हातार्या आणि बर्यापैकी जड शरीराच्या आजीना तर घोड्यावर
बसवलेले आणि दोन्ही बाजुने दोन लोक आधार द्यायला आणि तिसरा माणुस घोडा
सांभाळायला अशी कसरत चालु होती.त्या आजींचा चेहेरा बघवत नव्हता. असो.
तरसुमारे अर्धा-पाऊण तासात बर्फ़ाजवळ पोचलो. दोन डोंगरांच्या मध्ये वाहून
आलेल्या बर्फ़ाचा तो एक लांब च्या लांब पट्टा होता. स्लेज गाड्या आणि
स्कीइंग चे खेळ चालू होते.चहा मॅगी चे ठेले सजले होते.बऱ्यापैकी गर्दी
होती.
आम्हाला बर्फात पोचलो याचा अतिशय आनंद झाला.खरंतर हा पांढरा भुसभुशीत असा
बर्फ नव्हता. उन्हामुळे वितळायला लागलेला असाच होता. गमबूट घालून पण चालत
येत नव्हते. पाय घसरत होते.पण तरी आम्ही तिथे खुप खुप मज्जा केली. मसरूफ
भाई आमच्या घोड्यांसोबत चालत चालत वरतीपर्यंत आले होते. त्यांनी तिथल्या
स्लेज वाल्यांसोबत घासाघीस करून आमच्या साठी दर ठरवला. स्लेज च्या गाडीवर
बसून वरपर्यंत जायचे, तिथे टाईमपास करून मग त्याच गाडीवर ते आम्हाला घसरत
खाली आणणार होते.वरती पोचलो तिथे एक छोटासा धबधबा पण होता. वरवरचा बर्फ
काळा दिसत असला तरी बुटाच्या टोकाने थोडासा उकरला की आत शुभ्र पांढरा
भुसभुशीत बर्फ होता. मी आणि लेकीने स्नो मॅन बनवायची मज्जा पण केली. माझ्या
लेकीने, मधुजा ने तर मनापासून धमाल केली तिथे.बर्फ़ाचे गोळे करून
एकमेकांच्या अंगावर उडवून झाले.मनसोक्त फोटो, स्लो मो व्हिडीओ करून
झाले,तिचं लाडकं मॅगी तिला बर्फात खायचं होतं ते खाऊन झालं. तिचा फुललेला
चेहेरा बघून माझे डोळे वाहायला लागले.याचसाठी केला होता अट्टाहास.
मनातल्या मनात काश्मीर ला म्हणलं "आम्ही भरपुर बर्फ बघायला हिवाळ्यात परत यावं अशी तुझी इच्छा आहे ना, मग आम्ही नक्कीच येणार "
मसरूफ भाई गाईड कम फोटोग्राफर होते त्यांनी आमचे सुंदर फोटो काढले आणि
स्लेज वरून घसरताना चे व्हिडीओ सुद्धा केले.माझ्या मुलीचे आणि बहिणीचे चे
स्लेज राईड व्हिडीओ करायचे गडबड आणि गर्दी मुळे राहिले तर त्या भल्या
माणसाने स्लेज वाल्याला परत एकदा वर अर्ध्या वाटेपर्यंत जायला लावले, स्लेज
वाल्याने पण काहीही कटकट न करता त्यांना परत ओढत वरती नेले आणि परत स्लेज
ची घसरगुंडी करून व्हिडीओ घेतला.आम्ही नको,जाऊदे म्हणत होतो तर तो म्हणाला,
"दिदी, बादमे गुडीया बोलेगी उसका व्हिडीओ क्यू नाही लिया? नाराज हो जायेगी.उसको बुरा लागेगा ना"
स्लेज वरून घसरत येणं सोपं असलं तरी त्या तसल्या थंडीत स्लेज वर बसवून
एखाद्याला ओढत वर नेणं खूप अवघड आहे त्यामुळे मला या कृती चं जास्त कौतुक
वाटलं.
आता तिथे पण वातावरण बदलायला लागलं होतं.पाऊस पडायची चिन्ह होती. आज लंच
ला अपोआप बुट्टी मारली गेली होती पण आता पोटाने हाक द्यायला सुरू केले
होते.अजून घोडा-गंडोला-घोडा-कार असा लांबलचक प्रवास बाकी होता. 3.30 - 4
च्या दरम्यान उतरायला सुरुवात केली.मग केबल कार फेज वन ते बेस आणि मग
पार्किंग पर्यंत पोचलो. आता पोटात कावळे उड्या मारत होते. तिथल्या एका
हॉटेल मध्ये "पावभाजी" असा शब्द दिसला आणि ताबडतोब ऑर्डर दिली. जगात कुठेही
गेलं तरी पावभाजी खाल्लीच पाहिजे असं "माझं शास्त्र असतंय".
आणि आश्चर्य म्हणजे तिथे अप्रतिम पावभाजी आणि फार मस्त फ्रेश पाव
मिळाले.आता पोट आणि मन दोन्ही भरलं होतं. हॉटेल मधून बाहेर आलो तर अजून एक
सरप्राईज आमची वाट बघत होतं.आम्ही ज्यांच्यातर्फे टूर पॅकेज बुक केलं होतं
त्या Kashmir Heavens चे शाहिद भाई खास आम्हाला भेटायला पोचले होते.
त्यांना भेटून छान वाटलं. गेले 2 महिने विविध शंका विचारून फोन वर त्यांना
भरपूर त्रास दिला होता. आज प्रत्यक्ष भेटत होतो. त्यांनी ट्रिप कशी चालू
आहे वगैरे आपुलकीने चौकशी केली. आम्हाला फेज 2 ला जाता आलं नाही म्हणून
त्यांना पण वाईट वाटलं. सोनमर्ग ला झिरो पॉईंट चालू झाला आहे,उद्या तिथे जा
असे त्यांनी सुचवले. उद्या चं उद्या ठरवू असे म्हणून त्यांचा निरोप घेतला.
आज पाहिला त्यापेक्षा जास्त बर्फ आम्हाला फेज 2 ला नक्कीच दिसला असता पण "जे होतं ते चांगल्यासाठीच" यावर माझा गाढ विश्वास आहे.
(नंतर परत आल्यावर इथे मायबोली वरच वाचनात आलं की आम्ही गेलो त्याच्या
आधीच्या आठवड्यातच अचानक हवा खराब झाल्यामुळे फेज २ ला चेंगराचेंगरी ची
परिस्थिती निर्माण झाली होती) त्यामुळे आज जे काही मिळालं ते पण खूप
होतं.आम्हाला फ्रीज पेक्षा नक्कीच जास्त बर्फ मिळाला त्यातच आम्ही खुश
होतो. अजून काय पाहिजे 

गुलमर्ग ते श्रीनगर परतीचा प्रवास सगळा झोपेतच झाला. श्रीनगर ला पोचून नवीन
हॉटेल मधे सकाळी राहिलेलं चेकइन केलं.हॉटेल मध्ये लिफ्ट नव्हती आणि आमच्या
रूम तिसऱ्या मजल्यावर होत्या असा अजून एक किरकोळ गोंधळ तिथे झाला 
सकाळी हातातून निसटता निसटता आनंदाचं दान पदरात पडलं होतं त्यापुढे हा
गोंधळ म्हणजे किस झाड की पत्ती.आजचा दिवस असा गेला होता की आता अशा लहान
सहान गैरसोयी मन आपोआप स्वीकारत होतं.
रूम मध्ये पोचून मऊ बिछान्यावर अंग टाकताक्षणी गाढ झोप लागली.अजून एक सुंदर दिवस संपला होता.
२० मे २०२२
काश्मीर मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच उशीरा म्हणजे 8 वाजता जाग आली.
कालचा गुलमर्ग चा हँगओव्हर अजूनही गेला नव्हता. शरीर थकलं होतं.आजचा आमचा
दिवस ऑप्शनल होता, दुधपथरी किंवा सोनमर्ग.चाय पे चर्चा करून आम्ही
सर्वांनीच या दोन्ही वर काट मारली.दोन्हीकडे जाण्यासाठी कमीत कमी १.५-२ तास
प्रवास म्हणजे जाऊन येऊन ४ तास प्रवास करावा लागणार होता आणि अजून आम्हाला
शंकराचार्य मंदिर, लाल चौक भेट आणि खरेदी अशा गोष्टी करायच्या होत्या.
ही ट्रिप ठरवतानाच असे मनातून ठरवले होते की जास्त दगदग करून प्रत्येक
गोष्ट बघायचा अट्टाहास करायचा नाही.जिथे आहोत ते ठिकाण एन्जॉय करायचे.पहाटे
5 - 5.30 ला उठवून, ट्रिप मधले प्रत्येक ठिकाण टिक मार्क करत दाखवणाऱ्या
ट्रॅव्हल कंपन्यांची आणि आमची कुंडली कधी जुळू शकेल असे आम्हाला वाटत
नाही.त्यामुळे आम्ही अशा customized टूर चा पर्याय निवडला होता.पटापट आवरून
शंकराचार्य मंदिरात जायला निघालो.शंकराचार्य मंदिर एका टेकडी वर आहे
त्याला शंकराचार्य टेकडी म्हणतात. अर्धी टेकडी चढून गेलो तर ट्राफिक जाम
सुरू.
यंदा आम्ही काश्मीर ट्रिप बुक केल्यापासून अचानक सगळे ओळखीपाळखी चे लोक, नातेवाईक, मित्र मैत्रिणी या सगळ्यांच्या स्टेटस वर काश्मीर चेच फोटो दिसायला लागले होते. सगळेच अचानक काश्मीर ला जात होते.वर्तमानपत्रात काश्मीर मधील रेकॉर्ड ब्रेक गर्दी वगैरे बातम्या येऊ लागल्या. हे सगळं सगळं खरंच होतं कारण काश्मीर मध्ये कुठेही जा, लांबलचक लाईन आणि गर्दी असायचीच. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आम्हाला पहलगाम आणि गुलमर्ग च्या ऐन बर्फ़ात अगदी पुण्यातले ओळखीचे लोक सुद्धा भेटले. ( सारसबागेत सुद्धा ओळखीचे लोक भेटत नाहीत कधी पण काश्मीर ला भेटले ) फारच विषयांतर झालं असो.
तर शंकराचार्य टेकडी वर पोचायला ट्राफिक जाम मुळे खुप वेळ गेला.
मंदिराच्या पायथ्याशी चेकिंग वगैरे झाल्यावर पायऱ्या चढायला सुरू केले.
सुमारे 200-250 पायऱ्या चढून वर पोचलो. सुंदर असं दगडात बांधलेलं हे
शिवमंदिर आहे.हे मंदिर सम्राट अशोकाच्या मुलाने बांधले असे मानले
जाते.मंदिरात अत्यंत सुंदर असे चमकदार काळ्या पाषाणातले सुमारे 4 फूट
उंचीचे भव्य शिवलिंग आहे.
मंदिराच्या आवारातून संपूर्ण श्रीनगराचे अप्रतिम दृश्य दिसते.विस्तीर्ण
पसरलेला दल लेक, शिकारे, हाऊसबोटी, सुंदर रंगीत घरे, शहरात फिरून वाहणारी
झेलम नदी,हिरवेगार डोंगर असे अप्रतिम दृश्य वरून दिसते.
खूबसुरत कश्मिर
मंदिराचे आवारात चिनार ची सुंदर झाडे आहेत. संपूर्ण परिसर प्लॅस्टिकमुक्त
ठेवला आहे. खाली चेक पॉईंट पाशी सर्वांच्या सामानाची कसून तपासणी होते आणि
प्लॅस्टिक वस्तू तिथेच ठेवून यावे लागते.
आद्य शंकराचार्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी पूर्ण भारतभर पायी फिरले
होते. तेव्हा फिरत फिरत काश्मीर ला पोचले होते. या ठिकाणी त्यांनी तप केला
होता असे मानले जाते. जिथे त्यांनी तप केला ती दगडात कोरलेली गुहा सुद्धा
आहे. या मंदिराच्या परिसरातून जाऊच नये असे वाटत होते.आमच्या कडे भरपुर वेळ
होता त्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ रेंगाळलो. संपूर्ण श्रीनगर पुन्हा
पुन्हा डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवून ठेवले.
बघता बघता हवा बदलली. आणि पावसाचं चिन्हं दिसायला लागलं.
मग मंदिराच्या पायऱ्या उतरायला सुरू केले. तोवर छान भुरभुर पाऊस सुरू झालाच होता. खूप भूक लागली होती.
"आज मी रोटी भाजी किंवा कुठलाच भारतीय पदार्थ खाणार नाही" असे मधुजा ने आधीच जाहीर केले होते.
त्यामुळे दल रोड वरती एक इटालियन पदार्थ मिळणाऱ्या हॉटेल मध्ये गेलो. गरमागरम सूप, पास्ता ,पिझ्झा खाऊन सर्वांनी पोट शांत केले.
आणि आता मोर्चा वळवला लाल चौकाकडे.
लाल चौक, श्रीनगर.
अनेक कारणांनी वर्तमानपत्रात सतत चर्चेत असणारी जागा.याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे इथे नक्की भेट द्यायलाच हवी होती.
आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे खरेदी.खरेतर पहिल्या दिवसापासुन खरेदी चालुच होती पण तरी खरेदी साठी खास वेळ राखुन ठेवला होता आजचा
लाल चौक आणि इथल्या सगळ्या गल्ल्या काश्मिरी वस्तूंनी ओसंडून वाहतात. 100
रुपयांच्या कलाकुसर केलेल्या पर्स पासून अगदी एक लाख रुपयांच्या अस्सल
पष्मीना शालीपर्यंत इथे अनेक वस्तू मिळतात.अगदी विकतच घ्यायला पाहिजे असे
काही नाही पण लाखो रुपयाच्या शाली, गालिचे बघणे म्हणजे सुद्धा मेजवानीच
की.पर्स, नाजूक धाग्याने कशिदाकाम केलेले ड्रेस मटेरियल, साड्या, पडदे,
बेडशीट, अभ्रे, पाईन आणि अक्रोड लाकडाच्या वस्तू, सुकामेवा, केसर,स्वेटर,
टोप्या, शाली अशा अनेक वस्तू इथे मिळतात. सुमारे 2 तास तिथे मनसोक्त फिरलो.
शेवटी पायाने असहकार पुकारला तेव्हा हॉटेल चा रस्ता धरला.
आज श्रीनगर मधली शेवटची संध्याकाळ. उद्या सकाळी परत निघायचे होते. रुम वर
जाऊन थोडा आराम केला. आता पाऊस अगदी धो धो जोरातच सुरू झाला
होता.संध्याकाळी हॉटेल च्या आसपास चक्कर मारली. आमच्या हॉटेल जवळ एक
संपूर्ण लाकडात बांधलेला सुरेख पूल होता.
श्रीनगर चा "लकडी" पूल
तिकडे जाऊन आलो. हा फक्त पादचारी पूल होता, त्यावर सुरेख गझिबो आणि छानपैकी
लायटिंग केलेले होते. नदीवरून गार वारा वाहत होता. सुरेख ट्रिप ची सुंदर
सांगता होत होती.
हॉटेल वर परत येऊन सामानाची बांधाबांध केली.आणि झोपेच्या स्वाधीन झालो.
२१ मे २०२२
आमचे परतीचे विमान 11 वाजता होते पण श्रीनगर विमानतळावर आर्मी तर्फे कडेकोट
चेकिंग असते त्यामुळे सकाळी 7.30 लाच हॉटेल सोडले. वाटेत एका अस्सल पंजाबी
धाब्या वर अस्सल पंजाबी नाश्ता आणि चहा मिळाला. विमानतळावर वेळेत पोचलो.
सर्व चेकिंग च्या चक्रातून जाऊन ९.३० वाजता बोर्डिंग गेट पाशी पोचलो होतो.
बरोबर 11 वाजता विमान आकाशात झेपावले. श्रीनगर शहराला मनातल्या मनात "येतो
रे" असे म्हणत टाटा केले.
खरंतर ही डायरी कालच संपली असती. पण तरी काश्मीर बद्दल मला जाणवलेल्या आणि
आधीच्या कोणत्याही लेखात उल्लेख न केलेल्या काही सुटलेल्या गोष्टी लिहून
ठेवाव्यात असे वाटले म्हणून हे अजून एक पान.
श्रीनगर विमानतळावर उतरलो की एकदम वेगळी जाणवणारी गोष्ट म्हणजे सर्व ठिकाणी दिसणारे इंडियन आर्मी आणि CRPF चे सज्ज जवान.
डोळ्यात तेल घालून प्राणपणाने सर्व ठिकाणी लक्ष द्यायला ते सज्ज आहेत.
विमानतळावर आणि विमानतळाच्या बाहेर पडलो की दर 10-15 फुटावर बंदूकधारी जवान
दिसतोच.आणि फक्त चित्रपटात दिसणारे सिमेंट ची पोती लावुन तयार केलेले
बंकर्स पण दिसतात. जणु काही आता लगेच युद्ध सुरुच होणार आहे. सतत
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाड्यांचे आवाज येत जात असतात.सुरवातीला जरा
दचकायला होतं पण नंतर सवय होते आणि मग काही वेळाने त्यांच्यामुळे सुरक्षित
वाटायला लागतं. रस्त्याच्या कडेला भरगच्च फुललेला गुलाबाचा ताटवा आणि
त्याच्या मध्यभागी उभा असलेला बंदूकधारी जवान बघून एक क्षणी खुदकन हसू आणि
दुसऱ्या क्षणी त्यातला विरोधाभास जाणवतो.
लहान लहान मुलांच्या शाळेबाहेर आणि शाळेच्या आत सुद्धा जवानांची फौज राखण
करत असलेली बघुन नक्की काय भावना मनात आहेत ते कळतच नाही. बाग असुदेत की
मंदिर सर्व ठिकाणी आर्मी आणि CRPF सज्ज आहे.लाल चौकात तर चाहुबाजुने जवान
आणि बंकर्स आहेत.आपण निवांत फिरतोय आणि ते जवान अक्षरशः चहुबाजुला सावधपणे
बघत बंदुक रोखुन उभे असतात.
काश्मीर इतकं इतकं सुंदर आहे, त्यामुळेच की काय, आपल्या सर्वात देखण्या
लेकीचं वाईट लोकांपासून डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या बापाची भूमिका
भारतीय सेना पार पाडते आहे कदाचित.
एरव्ही वर्तमानपत्रात येणारे राजौरी, पुलावामा, उरी अशा गावांच्या नावांचे
बोर्ड रस्त्यात दिसतात आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकतोच.पण हे सगळं असलं तरी
तिथल्या लोकांचं वागणं बोलणं अत्यंत नॉर्मल असल्याने पेपर मध्ये येणारं
काश्मीर वेगळंच वाटतं आणि प्रत्यक्षात एक सुंदर पर्यंटनस्थळच
वाटतं.काश्मिरी लोकांशी अवघड विषयांबाबत बोलायचे आम्ही कटाक्षाने टाळले.
मुळातच हे सर्व काश्मिरी लोक पर्यटकांशी अत्यंत प्रेमाने, आदराने, आपुलकीने
वागतात.उगीच नको ते विषय काढण्यात आम्हाला पण रस नव्हता.
श्रीनगर बद्दल पेपर मध्ये वाचून जी प्रतिमा मनात होती त्याच्या एकदम वेगळंच
श्रीनगर आहे. आपल्या पुण्यासारखच सर्वसाधारण मोठं शहर, सर्व मोठ्या
ब्रँड्स ची दुकानं, सगळ्या प्रकारचे कुझिन्स मिळाणारी हॉटेल्स असे सर्व
एकदम नॉर्मल शहर. अर्थात ही परिस्थिती राखण्यात आर्मी चा हात असणारच पण
त्यावर भाष्य करणे हा या लेखाचा विषय नाही.
श्रीनगर मध्ये NIT, NIFT सारखी टॉप रेटेड कॉलेजेस आहेत.आम्हाला एकदा चक्क
नागपूर हुन श्रीनगर NIFT ला शिकायला आलेला एक मुलगा भेटला.महाराष्ट्रातून
आणि संपूर्ण देशातून भरपूर विद्यार्थी तिथे येतात असे त्या मुलाने
सांगितले.
आम्ही जिथे जिथे फिरत होतो त्या ठिकाणी स्थानिक काश्मिरी कुटुंबे मोठ्या
प्रामाणात दिसली.आम्ही ज्या ज्या बागांमध्ये गेलो तिथे अनेक स्थानिक
काश्मिरी कुटुंबे फिरायला, पिकनिक ला आलेली होती. ठळक लक्षात येणारी गोष्ट
म्हणजे हे लोक सोबत खाण्यापिण्याचे सामान , अगदी छोटी पोर्टेबल गॅस शेगडी
आणि चक्क कुकर घेऊन आलेले दिसले. तिथे हिरवळीवर मस्त स्वयंपाक करून जेवणे
चालू होती. बेताब व्हॅली मध्ये आणि अरु व्हॅली ला जायच्या रस्त्यावर अशी
अनेक कुटुंबे आम्हाला दिसली. स्थानिक काश्मिरी लोक हॉटेल मध्ये फारसे दिसत
नव्हते त्यामुळे त्यांना बाहेर जेवायला विशेष आवडत नसावे असे माझे मत झाले 
काश्मीरी लोक आपल्या कोकणी लोकांपेक्षा जास्त भात खाऊ आहेत असे जाणवले.
श्रीनगर मध्ये मुघल दरबार मध्ये आलेले काही जण नुसताच भात आणि रस्सा ओरपत
होते. रोटी वगैरे खाणारे जास्त करून पर्यटकच पाहिले.
सगळे च्या सगळे काश्मिरी एकजात देखणे, लालसर गोरे आणि सरळसोट नाकाचे होते.
इतके दिवसात नकट्या नाकाचा एकही काश्मिरी मलातरी दिसला नाही
आणि काश्मिरी स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल तर काय बोलू. सगळ्याजणी इतक्या
देखण्या होत्या की बस रे बस.काश्मीर चं सगळं सौंदर्य तिथल्या लोकांत पण
उतरलं आहे.
काश्मीर पॅकेज निवडताना आम्ही जेव्हा सगळ्या फेमस ट्रॅव्हल कंपनीज चा
अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही ग्रुप टूर करू शकणार
नाही.त्यांच्या टूर आमच्यासाठी हेक्टिक कॅटेगरी च्या होत्या आणि आमच्या
बजेट मध्ये पण नव्हत्या.
मग दुसरा पर्याय होता स्वतः सर्व प्लॅन करणे. पण काश्मीर सारख्या ठिकाणी
स्वतःच्या प्लॅनिंग ने जाणे मनाला पटेना. कोणीतरी आपली काळजी घेणारे
,अडीअडचणीला मदत करणारे असणे गरजेचे आहे असे वाटले.
फेसबुक वर श्रीनगर मधील लोकल टूर कंपनी काश्मीर हेवन्स चा पर्याय मिळाला,
त्यांचे बरेच चांगले रीव्यु वाचले. त्यांची एक एजंट पुणेकर आहे आणि इथे
पुण्यातुन काम बघते.तिच्याशी बोलले तेव्हा ते लोक खूप प्रोफेशनल आहेत हे
जाणवले.Kashmir Heavens चे लोक आणि त्यांची टीम श्रीनगर मधीलच असल्याने
पूर्ण itinerary बनवताना आम्हाला खूप मदत झाली. आम्ही अचानक केलेले सगळे
बदल देखील त्यांनी शांतपणे मान्य केले.
KHAB ट्रॅव्हल्स च्या सर्वच टीम ने आमची अतिशय व्यवस्थित काळजी घेतली.
त्यांचे फेसबुक पेज https://www.facebook.com/khabtravels/
अनेक वर्षांपासून काश्मीर ला जायचे स्वप्न पूर्ण झाले.
अजूनही रात्री डोळे मिटले की पहलगाम ची हिरवीगार कुरणे दिसतात, लीडर नदीचा
खळखळाट ऐकू येतो, गुलमर्ग चे शुभ्र बर्फ़ाचे डोंगर दिसतात, कहावा ची आठवण
येते. काश्मीर असं एका भेटीत कळणार नाही...तिथे परत परत जावंच लागणार...
अमीर खुसरो म्हणतात तसं...
आगर फिरदौस बार रू-ए-ज़मीन अस्त,
हमीन अस्त-ओ हमीन अस्त-ओ हमीन अस्त।
अगर धरती पर कहीं जन्नत है,
यही है, यही है, यही है
या सगळ्या लेखांच्या निमित्ताने परत एकदा मनाने तोच प्रवास करून आले.
प्रवासवर्णन लिहायचा पहिल्यांदाच प्रयत्न केला तो गोड मानुन घ्यावा.
-समाप्त
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.