https://dheerajwatekar.blogspot.com/2022/02/blog-post_13.html
आजच्या घडीला पर्यटन हा संपूर्ण जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा उद्योग आहे. जगातील कंबोडिया, मॉरिशस, बाली, थायलंड आदि अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. हे जरी खरे असले तरी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह जगातील समुद्रकिनारा लाभलेल्या जवळपास देशांच्या विकासाच्या मुळाशी कितीही ‘पर्यटन पर्यटन’ म्हटलं तर ‘पोर्ट डेव्हलपमेंट’ ही मूळ संकल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर स्थिरावण्यासाठी बंदर उद्योगांचा विकास होणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहात ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्र कसा असावा ? हे अभ्यासताना कोकण विभागात पर्यटन उद्योग स्थिरावण्यासाठी पायाभूत सुविधांसह बंदर विकासांची आवश्यकता विशेषत्वाने नोंदवली जायला हवी आहे.
एकविसाव्या शतकात कोकणासह भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला. देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या काही वर्गाच्या हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे सर्वत्र पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे विणले गेले. पूर्णत्वास गेला नसला तरी कोकणातही मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांतून कोकणातही पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचे चित्र तयार झाले. पर्यटन हा पारंपरिक भारतीय जीवनपध्दतीतील परमश्रध्देचा विषय आहे. तीर्थाटनाच्या माध्यमातून सुरु झालेले पर्यटन आज झपाट्याने आधुनिक बदल स्वीकारीत पुढे सरकत आहे. कोकणही त्यात मागे नाही आहे. कोरोना काळातही इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर नववर्षाचे स्वागत (२०२१-२२) करण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती. आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये वैयक्तिक सुखसुविधा आणि स्वच्छता हे मुद्दे कळीचे आहे. कोकणात तुलनेने स्वच्छता आहे. फारपूर्वी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निवास, प्रवास, खानपान सोयीसुविधांचे व्यवस्थापन आणि नियोजन करणे असे पर्यटन व्यवसायाचे स्वरूप होते. कालांतराने त्यात प्रत्यक्ष नियोजन करण्याची भर पडली. आजचा पर्यटन व्यवसाय हा पर्यटन उद्योग म्हणून विकसित होत आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेट बँकिंग आदि सोशल मीडिया मोठया प्रमाणावर साहाय्यभूत ठरत आहे. नवनवीन पर्यटन संकल्पना विकसित करून त्याद्वारे पर्यटन उद्योग बहुआयामी बनविण्याच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. कोकणातही हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हीरक महोत्सवी महाराष्ट्रातील कोकण पर्यटन अभ्यासत ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्राचा विचार करताना ‘कोकण पर्यटन डिजिटल विश्व’ मोठी भूमिका बजावणार हे नक्की आहे. अर्थात यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याची दृष्टी सकस व्हायला हवी आहे.
जागा स्वतःची असेल तर कोकणात पर्यटन उद्योग सुरू करताना लागणारी गुंतवणूक अत्यल्प असते. तसेच या व्यवसायात काही प्रमाणात का होईना, पर्यटकांच्या खिशातून अगोदर पैसे मिळत असल्याने ते प्राप्त करून त्यांच्यावर खर्च करून वर त्यांचीच प्रशंसा प्राप्त करण्याची नामी संधी हा व्यवसाय प्राप्त करून देतो. यात अनेकदा कोकणी स्वभाव आडवा येतो, हे वास्तव आहे. तरीही वर्षानुवर्षे उत्तम सेवा देणारी ठिकाणेही कोकणात कमी नाहीत. अशा ठिकाणच्या कोकणी पर्यटन व्यावसायिकांत आपल्याला उत्तम संवादकौशल्य, संभाषणचातुर्य, मनुष्य हाताळणीचे कौशल्य, विनम्रता, समयसूचकता, साहस, जिज्ञासा, नियोजनक्षमता, कॉमनसेन्स, निर्णयक्षमता, विषयज्ञान आदि गुण हमखास जाणवतात. म्हणून कोकणवर प्रेम करणारे पर्यटक सातत्याने अशा ठिकाणी आपल्या सुट्या व्यतित करत असतात. हे गुण असलेल्या व्यक्तिंची कोकण पर्यटन व्यवसायात वृद्धी होणे हे व्यावसायिक भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोकणात आज येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील मौजमजेसाठी, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पाहाण्यासाठी येतात. हेरिटेज, मंदिर स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, धार्मिक दर्शन, नाविन्यपूर्ण संकल्पना, इंडॉलॉजी, आर्किऑलॉजी, शहरीकरणाला कंटाळलेल्या पर्यटकांना ग्रामीण कोकणी जीवनाच्या परंपरांची, वैशिष्टयांची ओळख आणि अनुभव करून देणारे कृषी पर्यटन, कोकणाला लाभलेल्या सह्याद्री आणि सागराच्या सानिद्ध्यातील साहसी पर्यटन, दुर्गभ्रमण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्क्युबा डायव्हिंग, स्कीईंग, रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग यांसाठीही येतात. तसेच कोकणी घरे, संस्कृती, जीवनपध्दती, खाद्यसंस्कृती, चालीरिती यांचा अनुभव घेण्यासाठी, नदीची परिक्रमा किंवा उगम ते संगम सफर अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. विविध संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांसह विवाहासाठी ‘wedding destination’ म्हणून कोकणी सौंदर्याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण पर्यटकांत वाढते आहे. कोकणातील सण-उत्सवाला, आयुर्वेद, देवराई, वनराई, आकाशदर्शन, आदि पर्यावरणीय संकल्पना समजून घेण्यासाठी, ग्राम पर्यटन, संग्राहालये पाहण्यासाठी, बोर्डी (जि. रायगड) येथील ‘चिक्कू महोत्सव’, मुरुड-हर्णे-वेळास येथील ‘डॉल्फिन-कासव महोत्सव’, चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीतील क्रोकोडाईल सफारी, डॉल्फिन महोत्सव आदिंसाठी कोकणात पर्यटक येतात. कोकणातील पर्यटन व्यवसाय उद्योगाचे स्वरूप धारण करताना त्याला अधिकाधिक नवनवीन संकल्पनांद्वारे व्यक्त होण्याची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक पर्यटकस्नेही असायला हवा आहे. कोकण पर्यटन उद्योगाला आपले विश्व व्यापक करण्यासाठी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमावर भर द्यावा लागणार आहे. अलिकडच्या काळात तसे प्रयत्न होत आहेत. संजय नाईक यासाठी विशेष मेहनत घेत आहेत हे निश्चित स्वागतार्ह आहे. वास्तविक कोकणातील प्रत्येक महाविद्यालयात पर्यटन उद्योग विकसित करण्याविषयी मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यांना मार्गदर्शन आणि या विषयात लक्ष घालणारे करणारे कॉलेजच्या स्टाफरूमच्या बाहेरील पर्यटन विषयात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असायला हवेत.
कोकण पर्यटन उद्योगाच्या दुसऱ्या अडचणीच्या बाजूकडे आगामी १५ वर्षांच्या काळात काळजीपूर्वक लक्ष दिले तर कोकण प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था सांभाळू शकतो. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ३८ टक्के टक्के कारखाने कोकणात आहेत. जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कोकण महाराष्ट्राला देत आहे. मात्र हे उद्योग कोकणातील नद्या आणि खाड्या सातत्याने सर्वाधिक प्रदूषित करण्याचे काम करत आहेत. यांच्यामुळे कोकणातील शेती आणि मच्छिमार उद्ध्वस्त झाला आहे. कोकणाला हवा असलेला सागरी महामार्ग आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुंबई गोवा चौपदरीकरण मार्ग आजही अपूर्ण आहे. या रस्त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की अनेक ठिकाणी शासन-प्रशासनाला कंटाळून नागरिकांनी स्वतः रस्त्यांचे खड्डे भरायला घेतलेत. कोकणी माणसांनी काही ठिकाणी या खड्ड्यात वृक्षारोपण कार्यक्रमही केले. पण शासन-प्रशासन म्हणून याची कोणालाही लाज वाटत नाही. कोरोना कालखंडात उद्योगाकडे वळण्याचे स्वप्न पाहणारा त्यासाठी झटणारा कोकणातील पर्यटन व्यावसायिक कर्जांच्या विळख्यात सापडला आहे. त्याला सरसकट कर्जमाफी नको आहे. पण कोरोना संक्रमणात सापडलेल्या कोकणातील व्यावसायिकांना उभारी येण्यासाठी किमान कर्जावरील व्याजमाफी देण्याची भूमिका शासनाने घ्यायला काहीही हरकत असण्याचे कारण नाही, पण तेही होत नाही आहे. कोकणातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी बँकांची कर्ज काढून उभे केलेत. पायाभूत सुविधांची शब्दशः बोंब असताना कोकणातील निसर्गाच्या प्रेमामुळे पर्यटक कोकणात येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी कोकणातील ‘सेवाकर्मी’ पर्यटन व्यावसायिकाला शासकीय आधाराची गरज आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची मासळी हे कोकणाचे वैभव आहे. मागील काही वर्षांत शासनाने कोकणात पर्यटन महोत्सवांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचं मार्केटिंग व्हायला हवं आहे. कोकण पर्यटन व्यवसाय उद्योगात परावर्तित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कल्पक होण्याची आवश्यकता आहे. ‘कोकण पर्यटन उद्योग मिशन’ म्हणून कार्यरत व्हायला हवे आहे. विविध प्रकल्पांना होणारा कडवा विरोध आणि समर्थन या दोन्हींच्या मधला पर्यावरणस्नेही व्यवहार्य विचार रुजविण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी स्टरलाईट प्रकल्पाच्यावेळी जागतिक कीतीर्चे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर यांनी रत्नागिरीत येऊन स्टरलाईट प्रकल्प हानिकारक आहे असा अहवाल दिल्यावर हा प्रकल्प रद्द झाला होता. कोकणातील मायनिंग आणि इतर साऱ्या प्रदूषणकारी उद्योगांचा असाच निर्णय व्हायला हवा आहे. तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी इथली मागणी आहे. यात दक्षिण रायगडमधील २० महाविद्यालयेही समाविष्ट होऊ शकतात. काही संस्थाचालकांना आजही ‘मुंबई विद्यापीठ’ ची भुरळ आहे. यातून मार्ग निघायला हवा आहे. रोजगार देणारे कौशल्य शिक्षण कोकणात हवे आहे. समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, मेरिटाईम, रेल्वे तंत्रज्ञान आदि अभ्यासक्रम कोकणाला हवे आहेत. त्यातून इथले उद्योगजगत विकसित होईल. आगामी काळाचा वेध घेताना हे विचार महत्त्वाचे असणार आहेत.
कोकणात २००९ मध्ये आलेल्या फयाननंतर निसर्ग, तोक्ते अशी ४/५ वादळे आलीत. महापूर-वादळांनी कोकणाची सर्व बाजूंनी नव्याने उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. कोकणच्या उद्योजकीय विकासासाठी अशा संकटांची व्याप्ती आणि खोली शासकीय पातळीवर समजावून घेतली जायला हवी आहे. इथल्या सामान्य शेतकऱ्यांचे जीवन हे आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, करवंद, केळी, मिरी यांवर अवलंबून आहे. महापूर-वादळात यांचे अमाप नुकसान होते. अशावेळी मिळणारी शासनाची मदत साफसफाई करायलाही पुरत नाही. अशा वातावरणात अंदाजे वर्षातील ६० ते ९० दिवस चालणारा पर्यटन व्यवसाय भविष्यात ‘उद्योग’ म्हणून कसा झेपावेल ? यावर आजच विचार व्हायला हवा आहे. कोकणात कोणताही मोठा उद्योग येत नाही. मुंबईत बसून कोकणाच्या भवितव्याचे निर्णय घेणारे पुढारी कोकणाचा विकास करत आहेत. कोकणातील जमिनींचे कसाई भरमसाट दराने शेत जमिनी विकत घेऊन त्यांचे तुकडे पाडून करोडपती बनले आहेत. याची दुसरी बाजू ही की यातून जमिनीच्या वाढलेल्या भरमसाट दरांमुळे नव्याने जमीन घेऊन बाग लावणे हे आता कोकणी माणसासाठी दिवास्वप्न ठरते आहे. महाराष्ट्रात एप्रिल १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी तीन वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली होती. तेव्हा ‘उर्वरित’ समजून कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले. आर्थिक विकासात कोकणाची उपेक्षा आणि अन्यायाची वेग इथून आणखी वाढला. आतातर ही मंडळे कुठे गुंडाळून ठेवलीत देव जाणे ! म्हणून देशासह राज्याच्या आर्थिक विकासात सतत उपेक्षित असलेल्या कोकणाचा विकास होण्यासाठी 'कोकण प्रादेशिक विकास मंडळ' स्थापन करायला हवे आहे. संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करायला हवे आहे. यात कोकण पर्यावरण, महापूर, नद्यांची पात्रे, प्रदूषण, फलोत्पादन, मत्स्योत्पादन धोरण, लहान मच्छिमारांना मोठ्या सवलती, पर्यटन उद्योग कोकण विकासाचा केंद्रबिंदू करण्याचे नियोजन, पायाभूत सुविधा, किफायतशीर हॉटेल बांधण्यासाठी उद्योजकांना सहकार्य, छोट्या-छोट्या धरणांची आवश्यकता, प्रदूषण आदिंचा विचार व्हायला हवा आहे. कोकण विकासाच्या योजनांचा नेहमी मोठा गाजावाजा होतो. योजना जाहीर होतात. मात्र योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना फोलपणा समोर येतो. खर्च होऊनही परिणाम साधला गेलेला नसतो. पुन्हा विकासाचा मुद्दा चर्चेला येतो. पुन्हा नवी योजना येते. महाराष्ट्राचा अमृत महोत्सवी वेध घेताना असंच होत राहाणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे.
गेली पन्नासहून अधिक वर्षे कोळसेवाले आणि आता लाकूडतोडे जंगलमाफिया सह्याद्रीचे लचके तोडत आहेत. कोकणातील घाटातून असंख्य ट्रक भरून लाकडे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांचे बॉयलर पेटवण्यासाठी जातात. इथल्या एम.आय.डी.सी.मधील कारखाने नद्या-खाड्या प्रदूषित करतात. आज प्रचंड जंगलतोडीमुळे कोकणातले डोंगर उघडेबोडके झालेत. जमीन धरून ठेवायला झाडेच नसल्यामुळे डोंगरावरील माती, दगड, गोटे नदी-खाड्यांत आलेत. गाळ वाढलाय. पिढ्यांपिढ्या कोकणी माणूस पाऊस अनुभवतोय. कोकणातल्या काही भागात तर ६/८ महिने पाऊस पडायचा. पण डोंगर खाली येणे, दरडी कोसळणे आणि महापूर येणे हे नित्याचे प्रकार होत नव्हते. ते आज होतायेत, याला कारण अनियंत्रित विकास हेच आहे. निसर्गरम्य कोकणात विदेशी वृक्षांची लागवड नको यासाठी आमदार शेखर निकम आग्रही आहेत. पर्यावरणप्रेमींचीही ही मागणी आहे. तिचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. कोकणात पर्यटन उद्योग बहरण्यासाठी पायाभूत सुविधा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोकणात ७०/८० पर्यटन ग्राम आहेत. राज्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा वेध घेताना किमान या गावात चोवीस तास वीजपुरवठा, पाणी, पक्का दुपदरी रस्ता, पार्किंग, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आदि मुलभूत मूलभूत सुविधा या गावांमध्ये असतील अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. कोकण पर्यटन विकासाचे कामे मार्गस्थ करताना कोकण पर्यटनकर्मींना खूप अडचणी येतात. बांधकामांसह विविध शासकीय बाबी पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगीची सिंगल विंडो व्यवस्था असायला हवी आहे. कोकणातल्या खाड्यात पर्यटक बोटीतून फिरवायचे असतील तर मेरिटाईमसह शासनाच्या सर्व परवानग्या क्लिष्ट आहेत. शासनाकडे भरावे लागणारे शुल्क आणि वर्षाकाठी जमणारी गंगाजळी यांचे गणित जुळत नसल्याचा अनुभव गेली ७/८ वर्षे चिपळूणातील ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था घेत आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन उद्योग विकसित होण्यासाठी अशा प्रयत्नांना जाचक अटीत न अडकवता पाठबळ द्यायला हवं आहे. सागरकिनारा लाभलेल्या जगातील बहुसंख्य देशात रेल्वेही सागरकिनाऱ्यावरून जाते. कोकणात मात्र ती सह्याद्रीतून नेण्यात आली. हे कौशल्याचे काम होते. त्यासाठी सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत. मात्र आज कोकण रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकण्यात अडचणी येताहेत. म्हणून कोकण रेल्वेने आगामी ट्रॅकसाठी सागरकिनाऱ्याकडे आणि त्यातील रिंगरूटकडे पाहायला हवे. ही आणि ‘पोर्ट’ विकासाची माजी आमदार प्रमोद जठार यांची आग्रही मागणी रास्त आहे.
कोकणात एकविसाव्या शतकात, पूर, महापूर, वादळे,
चक्रीवादळे आदिंनी कोकण भूमीला हैराण केले आहे. पर्यावरणीय ह्रासाचे हे परिणाम भविष्यात
अधिकाधिक गडद होत जाणार आहेत, असं यातल्या तज्ज्ञांचं मत आहे. ते विचारात घेता
शासकीय पातळीवर अशा आपत्तींपासून बचाव होण्यासाठी तसेच आपत्तीग्रस्तांना त्वरित न्याय
मिळण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण व्हायला हवी आहे. तात्पुरत्या मलमपट्टीस्वरूप
उपचारांनी कोकणात ‘पर्यटन उद्योग’ ही संकल्पना अशा आपत्तीत किती टिकाव धरेल हा
प्रश्न भविष्याचा वेध घेताना पडतो आहे. कोकण पर्यटन उद्योग साकारण्यासाठी हवी
असलेली हजारो कोटींची गुंतवणूक कोकणात आणण्यासाठी ‘पोर्ट’ हाच सर्वोत्तम मार्ग
आहे. त्याकडे लक्ष दिल्यास कोकण पर्यटन उद्योग उद्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्राची
अर्थव्यवस्था सांभाळेल.
धीरज वाटेकर चिपळूण
मो. ०९८६०३६०९४८
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद
मौजे धामणवणे येथील पर्यटन प्रसिद्ध श्रीविंध्यवासिनी
मंदिराच्या पाठीमागे ११ जानेवारीला प्रा. चेतन खांडेकर यांच्या घराच्या आवाराला
लागून असलेल्या ओढ्यात कोणीतरी मार्जार कुळातील प्राणी ओरडत असल्याचा आवाज येऊ
लागला. म्हणून खांडेकर यांनी त्यांचे मित्र अॅड. चिन्मय दिक्षित यांना कळवले. दिक्षित
यांनी वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांना ही माहिती दिली. ओंकार यांनी प्रत्यक्ष
घटनास्थळी येऊन पाहिले असता त्यांना दीड-दोन महिन्याचे बिबट्याचे एक पिल्लू
निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क केला. वनरक्षक रा. र. शिंदे, पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर यांनी तातडीने येऊन पाहाणी केली. तेव्हा कोरड्या ओढ्यात
दगडाच्या कपारीत बिबट्याचे मादी जातीचे पिल्लू सर्वांना दिसले. वन विभागातील
कर्मचाऱ्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. चिपळूणचे वनविभाग अधिकारी सचिन
निलख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्वानुमते, ‘बिबट्याच्या पिल्लाला
त्याची आई, मादी बिबट्या घेऊन जाते का ?’ यासाठी प्रयत्न करायचे निश्चित झाले. श्रीविंध्यवासिनी
मंदिराच्या नजीक कोरड्या ओढ्याच्या वरच्या बाजूला जिथे पिल्लू सापडलं त्याच
वातावरणात एका लाकडी फळ्यांच्या बॉक्समध्ये पिल्लाला ठेवण्यात आलं. घटनेची नोंद
व्हावी म्हणून ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला. टीमचे सदस्य सुरक्षित अंतरावर बसून
राहिले. रात्री पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येत राहिला. पण मादी बिबट्या आली नाही. उलट
एका क्षणी आपल्या नखांचा उपयोग करून ते पिल्लूच बॉक्समधून बाहेर आलं. आजूबाजूला वावरू
लागलं आणि कुणाला काही कळायच्या आत अचानक ट्रॅप कॅमेऱ्याच्या कक्षेच्या बाहेर गेलं.
आता काळोख्या अंधारात पिल्लू दिसेनासं झालेलं. मध्यरात्र असल्याने पिल्लाला शोधणंही
शक्य नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी, १२ जानेवारीला बिबट्याच्या पिल्लाचा
शोधघेणे सुरु झाले. पण ते पिल्लू सापडेना. शोधण्यात दोनेक तास गेले असतील. ट्रॅप
कॅमेऱ्यापासून दोनशे मीटर अंतरावर एका बागेतून पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या
दिशेने शोध सुरु झाला. तेव्हा त्या बागेतल्या सागवानाच्या सुकलेल्या मोठाल्या
पानांच्या आडोशाला पिल्लू लपून बसलेलं दिसलं. हे पिल्लू मादी जातीचं होतं. आईचे दूध
न मिळाल्याने पिल्लू अशक्त झालेलं होतं. पिल्लाला कृत्रिमरित्या दूध (लॅक्टोजन) पाजण्यात
आलं. डॉक्टरांनी त्याची वजन आणि आरोग्य तपासणी केली. वनविभागाच्या एस.ओ.पी. (स्टॅन्डर्ड
ऑपरेटींग प्रोसिजर) नियमानुसार ‘पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का ?’ यासाठीचे
प्रयत्न करायचे निश्चित झाल्याने पिल्लाच्या आईचा, मादीचा शोध सुरु झाला. त्या सायंकाळी
लाकडाच्या खोक्यात पिल्लाला ठेवून बाजूस ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. सुरक्षित
अंतरावरून नजर ठेवणे सुरूच राहिले.
तिकडे श्रीविंध्यवासिनी मंदिर परिसरात हे प्रयत्न सुरु
असताना रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांना धामणवणे येथील
श्रीविठ्ठलाई मंदिर परिसरातील मालकीच्या शेतात बिबट्याचे पिल्लू असल्याबाबत
निसर्गप्रेमी रोहन शेंबेकर यांनी कळविले. त्या दिवशी शेंबेकर यांच्या बागेतकाम
करणारे कामगार कांबळी यांच्या पत्नीला दुपारी १२ वाजल्यापासून कोणा प्राण्याच्या
ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. ती महिला दिवसभर कांबळींना म्हणत राहिली, ‘मांजर
ओरडतंय म्हणून !’कांबळींनी शेवटी सायंकाळी शेंबेकर यांना बोलावून घेतले. तोवर कांबळींच्या
मुलाने ओरडणाऱ्या पिल्लाचा अगदी जवळून मोबाईलवर फोटो काढलेला होता. सायंकाळी बागेत
आलेल्या शेंबेकर यांनी मोबाईल मधला तो फोटो पाहिला. तेव्हा त्यांना संशय आला. एका
क्षणी त्यांनी ही पिल्लाचा आवाज ऐकला. शेंबेकर आवाजाच्या दिशने मार्गस्थ झाले. पण
बिबट्याचं पिल्लू जवळपासच्या झुडुपात लपल्याने त्यांना दिसलं नाही. शेंबेकर यांनी
मोबाईल मधला फोटो निलेश यांना पाठविला. दोघांचं बोलणं झालं. फोटो पाहताच तातडीने निलेश
यांनी धामणवणे गाठले. पण तोवर सायंकाळ झाली होती. निलेश यांनी वन विभागाच्या
कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून बिबट्याच्या पिल्लाचा विषय सांगितला. आणि ‘धामणवण्याच्या
मंदिराजवळ या !’ असं सुचविलं. तेव्हा वन विभागाचे कर्मचारी, ‘आम्ही पिल्लाजवळच
आहोत’ असं सांगू लागले. संवादात थोडावेळ कन्फ्युजन झालं. ‘कुठल्या पिल्लाजवळ ?’ असं
निलेश यांनी विचारल्यावर ‘देवळाजवळ !’ असं उत्तर मिळालं. शेवटी या संवादात निलेश
यांच्या ‘कुठल्या देवळाजवळ ?’ या प्रश्नाच्या उत्तरामधून श्रीविंध्यवासिनी आणि श्रीविठ्ठलाई
या दोन स्वतंत्र देवळांच्या ठिकाणांचा उलगडा झाला.
आता तिसऱ्या दिवशी, १३ जानेवारीला सकाळ-सकाळी श्रीविंध्यवासिनी
जवळच्या पहिल्या पिल्लाची सर्वांनी पाहाणी केली. तेव्हा पिल्लूबॉक्स मध्येच आढळून
आलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पिल्लाची तपासणी केली. पिल्लू सुस्थितीत होते. ट्रॅप
कॅमेरा तपासण्यात आला. त्यात कोणत्याही विशेष हालचालीची नोंद नव्हती. प्रयत्न करणाऱ्या
सर्वांच्या मनात निराशा निर्माण झाली. श्रीविंध्यवासिनी जवळच्या पिल्लाला बॉक्सच्या
तुलनेत एका लहान बास्केटमध्ये घालून डोंगराच्या दमवणाऱ्या चढाने शोधाशोध करत सारेजण
शेंबेकर यांनी दाखवलेल्या बागेच्या आवारातील जागेच्या दिशेने मार्गस्थ झाले. हा
मार्ग निवडण्यामागे मादी बिबट्या याच मार्गाने खाली उतरल्याचा प्राथमिक अंदाज होता,
जो खरा होता. याच मार्गावर मध्यभागी डोंगरातून ग्रॅव्हिटीने आणलेल्या पाण्याचा एक
पाणवठा आहे. पाणवठा ते विठ्ठलाईच्या दरम्यान मादीला विणीसाठी उपयुक्त ठरू शकतील
अशा २/३ आडोश्याच्या जागा टीमच्या निदर्शनास आल्या. तिथे थांबून दुसऱ्या पिल्लाचा
शोध घेण्यात आला. मात्र दुसरे पिल्लू सापडले नाही. शोधाशोध करत सारेजण, कामगार
कांबळी यांच्या मुलाने बिबट्याच्या पिल्लाचा फोटो काढलेल्या जागेवर पोहोचले. तेव्हा
विणीची जागा हीच असावी असा तर्क बांधण्यात आला. दोन वर्षापूर्वी या भागात मादी
बिबट्याचा वावर दिसून आलेला होता. याची माहिती वन्यजीव अभ्यासकांकडे होती. सध्याच्या
दुसऱ्या पिल्लाचा फोटो काढलेल्या या जागेपासून जवळच पाण्याची उपलब्धी होती. मोठ
मोठ्या दगडांच्या कपारीचा आडोसा होता. तणरूपी रानमोडीचं जंगल वाढलेलं होतं. त्यातून
चालणं कठीण होतं. याच ठिकाणी काल बिबट्याचं दुसरं पिल्लू दिसलं होतं. त्यामुळे आता,
‘या ठिकाणी बास्केटमधून सोबत आणलेलं बिबट्याचं पाहिलं पिल्लू ओरडलं तर त्याचा आवाज
ऐकून दुसरंही ओरडेल आणि शोधणे सोपे होईल’, अशी स्वाभाविक अपेक्षा टीमच्या मनात
होती. टीमने सकाळी ७ वाजता पहिल्या पिल्लाला घेऊन चालायला सुरुवात केली होती. त्याला
आता पाचेक तास उलटले होते. दुपारी १२ वाजून गेल्यानंतरही दुसरे पिल्लू मिळालेले
नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. पण इकडे घटनेत काहीच नवीन घडत नव्हतं. मादी
बिबट्याच्या वर्तणुकीचा आणि तिच्या अस्तित्वाचा अंदाज बांधणे कठीण झाले होते.
दुपारची १२ वाजून ३७ मिनिटे झाली असतील. बास्केटमधील पहिलं
पिल्लू अचानकपणे सलग ४/५ वेळा ओरडलं. अन् त्याक्षणी दुरून कुठूनतरी दुसऱ्या
पिल्लाच्या आवाजाचा हलकासा कॉल सर्वांच्या कानावर आला. खरंतर तो क्षण, ‘आत्ता मादी
बिबट्या इथे आली तर ?’ या विचारातून मनात कमालीची अनामिक भिती निर्माण करणाराही
होता. पण का कोण जाणे ? टीमला अशी भिती वाटत नव्हती. त्याच निश्चित कारण ती
निसर्गशक्तीच सांगू शकेल. भर जंगलात मादीच्या विणीच्या जागेजवळ बिबट्याच एक पिल्लू
ओरडतंय, काही क्षणांनी दुसऱ्या पिल्लाचा हलकासा का होईना पण आवाज ऐकू आलाय आणि
मादी बिबट्या मात्र अजूनही समोर आलेली नाही. जवळपास तिच्या असण्याचा कोणताही पुरावा
दिसून येत नाही. अशी साधारण स्थिती होती. वेळ दिवसाची दुपारची असल्याने टीमचे काही
सदस्य आवरायला तर काही जण पिल्लाला दूध आणायला निघून गेले. एक-दोघेजण जागेवर
थांबून राहिले. वन्यजीव शास्त्रानुसार साधारणत सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत पिल्लं
असताना किंवा नसताना बिबट्या सक्रीय (active) नसतो. त्यामुळे भिती तशी कमी झालेली
होती. पण तरी सुद्धा बिबट्या मादी, ‘आत्ता आली तर ? किंवा इथेच असेल तर ?’ हे स्वाभाविक
प्रश्न मनात येतच होते. तरीही अशा मानसिक अवस्थेत उपस्थित दोघा सदस्यांनी जमिनीवर
सुरक्षितपणे काठी आपटत रानमोडीच्या जंगलाचा डोळ्यादेखतचा सारा परिसर पिंजून काढायला
सुरुवात केली. बघताबघता दुपारचा दीड वाजला, तरीही दुसरं पिल्लू सापडण्याची चिन्हे
दिसेनात. शेवटी बास्केटमधील पहिल्या पिल्लाजवळ येऊन दोघे सदस्य बसलेआणि अचानक आतलं
पहिलं पिल्लू पुन्हा ओरडू लागलं. त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडलं, पण आताही एकदाच !
अर्थात टीम सदस्यांना दुसऱ्या पिल्लाचा आढळ कळायला तेव्हढं ओरडणं पुरेसं होतं. दुसरं
पिल्लू जवळपासच कुठेतरी आहे, हे आता नक्की झालं होतं. कदाचित ते सहज नजरेला पडणार
नाही अशा रितीने कॅमॅफ्लॉज झालेलं असावं. आता सगळी टीम आल्यावर पुन्हा एकदा
रानमोडीच्या जंगलाचा परिसर पिंजायचा असं ठरलं.
एकतर आवाज येणारं पिल्लू मिळायला हवं होतं किंवा सध्या टीमच्या
सोबत असलेल्या पिल्लाला मादी बिबट्याने येऊन घेऊन जाणं आवश्यक होतं. तासाभराने पुन्हा
टीम एकत्र जमली. सर्वांनी जेवण केलं आणि ३ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधाशोध सुरु
झाली. सायंकाळी ४ च्या सुमारास माडाच्या झाडाखाली दगडांच्या दरी सदृश्य कपारीत
गर्द झावळ्यांमध्ये दुसरं पिल्लू अंग चोरून खूप आत दडून बसलेल्या अवस्थेत आढळलं. ते
पिल्लू नर जातीचं होतं. ज्या ठिकाणी हे पिल्लू आढळलं त्या ठिकाणी दोघांच्या टीमने
पूर्वी दोनदा फेरफटका मारलेला होता. पण तेव्हा पिल्लू दिसलेलं नव्हतं. डोळ्यातून
प्राण गेल्यावर माणसाचे उघडे डोळे जसे जाणवतात तसं बिबट्याच्या या दुसऱ्या
पिल्लाकडे बघून क्षणभर जाणवलं. त्याचं शरीर कॅमॅफ्लॉज झालं होतं. दुपारी १२
वाजेपर्यंत दोनदा कॉल दिल्यानंतर चारेक तासांनी ते दिसलेलं होतं. त्याच्या पोटाची
हालचाल जाणवल्यावर टीमच्या जीवात जीव आला. पिल्लाला वाहेर काढलं तेव्हा तर ते गुरगुरत
अंगावरच आलं. त्याची तपासणी केली. ते सशक्त होतं. सुरुवातीला एकमेकांवर गुरगुरून
झाल्यावर काही वेळांनी दोन्ही पिल्लं एकमेकांत रमली. आता दोन्ही पिल्लांना बॉक्समध्ये
एकत्रित पाहिलं तर दुसर मिळालेलं पिल्लू हे पहिल्यापेक्षा २/४ दिवसांनी मोठं वाटत
होतं. पण तसं ते नसावं. खरंतर पहिलं भेटलेलं पिल्लू अधिक सशक्त असावं. म्हणूनच तर ते
श्रीविठ्ठलाई ते श्रीविंध्यवासिनी असं डोंगर ओढ्याच्या मार्गाने उतरून मादीसोबत
फिरत फिरत खाली आलेलं होतं. पहिलं पिल्लू भेटलं तेव्हा अशक्त होतं कारण ते डी-हायड्रेट
झालं असावं. दोन दिवस त्याला काही खायला, आईचं दूध प्यायला मिळालेलं नव्हतं. टीमने
दूध पाजलं पण ते दूधही पिल्लू सुरुवातीला पित नव्हतं. जेवढं पित होतं ते पोषणाच्या
दृष्टीने कमी होतं. अशा विषयात मादी बिबट्यांना काऊन्ट नसतो. विंध्यवासिनी परिसरात
सुरक्षेच्या दृष्टीने अडचण जाणवली असल्याने मादी बिबट्या आल्या पाऊली परत फिरली
असावी आणि येताना तिच्यासोबत आलेलं पिल्लू ती निघून जाताना मात्र खालीच राहिलं. मादीने
डोंगरावर श्रीविठ्ठलाई जवळच्या पिल्लाला मात्र दूध पाजलं असावं. नंतर ती इथून निघून
गेली असावी. कदाचित म्हणून सापडलेलं दुसरं पिल्लू सशक्त असण्याबरोबर त्याच्या जवळ
जाण्याचा प्रयत्न केला की बचावात्मक पवित्र्यात यायचं. नखं बाहेर काढून सर्वांच्या
अंगावर यायचं, गुरगुरायचं. यातला योगायोग असा की पाहिलं श्रीविंध्यवासिनीजवळ
मिळालेलं मादी जातीचं पिल्लूही सायंकाळी ४ वाजताच मिळालं होतं. दोन्ही पिल्लं
ताब्यात मिळाल्यावर वन खात्याच्या एस.ओ.पी. नुसार अशा प्रसंगात सापडलेल्या
वन्यजीवांना हाताळण्याबाबतच्या नियमावलीनुसार काम सुरु झालं. दोन्ही पिल्लांसाठी
पुन्हा प्लायवूडचा बॉक्स बनविण्यात आला. श्रीविंध्यवासिनीजवळ सापडलेल्या
पिल्लासाठी पहिल्यांदा बनविलेला जाड फळ्यांचा लाकडी बॉक्स मोठा होता. तो डोंगरावर आणणे
कठीण होते. म्हणून नवीन बॉक्स बनविण्यात आला. ट्रॅप कॅमेरा झाडाला लावता येईल अशी
बिब्बीच्या झाडाजवळची जागा निश्चित करण्यात आली.
मादी बिबट्या आली तर ती बॉक्समधल्या पिल्लांना घेऊन जाईल
असा अंदाज होता. वन्यजीवांत बिबट्याची जात धूर्त आणि हुशार मानली जाते. एव्हाना खरंतर
बिबट्याचा जंगलात सक्रीय होण्याचा वेळ सुरु झाला होता. म्हणून सायंकाळी अंधार
पडेपर्यंत सारी टीम सुरक्षित अंतरावर थांबली होती परंतु मादी बिबट्या आली नाही. शेवटी
पिल्लांना बॉक्समध्ये ठेवून त्यावर ट्रॅप कॅमेरा लावून सारे चिपळूणला निघून आले. रात्री
जेवणानंतर पुन्हा टीमने अख्या धामणवणे गावाला एक फेरफटका मारला. गावातल्या कोणाची
गाय, कुत्रं (कॅटलकेस) मारलं गेलं आहे का ? याचा शोध घेतला. मात्र संपूर्ण गावात
असं काहीही घडलेलं नव्हतं. कोणाला मादी बिबट्या दिसलेलीही नव्हती. १५ दिवस आधी
मात्र गावातल्या अनेकांनी बिबट्याला पाहिलेले होते. पाहणाऱ्यांना बिबट्या जातीने नर
की मादी हे सांगता येत नव्हते. रात्रीचा फेरफटका मारून परतताना, पाणवठ्यावरून श्रीगणपती
मंदिराच्या परिसराकडे येणाऱ्या मार्गावर, ‘कोणाचा आवाज येतोय का ?’ हे ऐकायला टीम थांबली.तेव्हा
त्यांना मादी बिबट्याने एका मातीच्या ढीगाऱ्यावर उभ्या असलेल्या अवस्थेत दर्शन
दिलं. पण तेव्हा ना मादी ना ही मंडळी पिल्लांजवळ होती.
चौथ्या दिवशी पहाटे, १४ तारखेला टीमने सात-सव्वासातच्या
सुमारास जाऊन ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबता क्षणी सारेजण शहारले.
कारण ६ वाजून ५७ मिनिटांनी मादी बिबट्या खोक्याच्या शेजारी बसलेली असल्याचा शेवटचा
फोटो अचानक डोळ्यासमोर आला. अर्थात टीमच्या आगमनाची चाहूल लागताच २/४ मिनिटात मादी
बिबट्या निघून गेली होती. हे लक्षात आल्याने आणि मादी बिबट्या जवळपास कुठेतरी असू
शकते या जाणीवेने टीम आल्यापावली मागे फिरली. खोक्यापासून दूर सुरक्षित अंतरावर गेली.
गडबडीत कॅमेऱ्याचं शटर बंद करायचं राहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबून शेवटचा फोटो
चेक केल्यावर कॅमेरा पूर्वस्थितीत आणायचाही राहून गेला होता. सकाळी ११ वाजता
कॅमेरा पुन्हा सुरु करण्यात आला. पहिल्या ३ दिवसात पिल्लांकडे मादी बिबट्या न
फिरकल्याने, एवढ्या मोठ्या कालखंडात, पिल्लांच्या हाताळणीत एकदाही टीमला कोणत्याही
प्रकारचा त्रास न देणारी, ‘मादी बिबट्या अशी का वागत्येय ?’ असा प्रश्न निर्माण
झाला होता. पिल्लांच्या असण्याच्या काळातलं मादी बिबट्याचं हे वर्तन थोडं अचंबित
करणारं होतं. तत्पूर्वीपर्यंत, ‘मादी बिबट्या मेलेली असावी !’ असाच कयास टीमने बांधला
होता. वन्यजीव नियमावलीनुसार अशाप्रसंगी पिल्लांच्या आईच्या येण्याची किमान सहा
दिवस वाट पाहायची असते. त्यानंतरच पिल्लांना देखभाल केंद्रात दाखल करायचे असते. या
प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसांचा अवकाश होता. बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना दूध
पाजून (फिडिंग), तपासणी करून खोक्यात ठेवलं गेलं. चौथा दिवस सरताना रात्री उशीराच्या
फेरफटक्यात गावातल्या एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर मादी बिबट्या दिसली.
रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्यावर असलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी, हे
पाणी वाहात जात असलेल्या शेतातही नंतर ती दिसली.
पाचव्या दिवशी, १५ तारखेला सकाळी येऊन ट्रॅप कॅमेऱ्यात
पाहिलं तेव्हा मादी बिबट्या बॉक्समधील पिल्लांना चाटत असलेलं दिसलं. मादीची
पिल्लांप्रती असलेली वत्सलभावना ट्रॅप कॅमेऱ्याने बरोबर टिपलेली होती. खरंतर तेव्हा
ती पिल्लांना बॉक्समधून बाहेर काढू शकत होती. पण तिने तसं करणं टाळलेलं होतं. इतकंच
काय ? स्वतःच दूध पाजलं नव्हतं की पिल्लांना आपल्यासोबत नेलं नव्हतं. ‘कोणीतरी हा
ट्रॅप तर लावलेला नसेल ना ? मी बॉक्सच्या आत गेले तर अडकेन ?’ अशा विचाराने मादी बिबट्या
खोक्यात गेलेली नसावी. बॉक्सची सध्याची जागा असलेल्या आजूबाजूला अनेकांच्या आंबा-काजूच्या
बागा आहेत. काही जागा नुसत्या कुंपण घातलेल्या आहेत. सकाळी अनेकजण इथल्या जवळच्या
मार्गावरून मॉर्निंग वॉक करत असतात. त्यामुळे दुसरा तर्क असा होता की मादी
बिबट्याच्या दृष्टीने सध्याची पिल्लांची जागा हीच सर्वाधिक सुरक्षित होती. पिल्लांना
घेऊन जाण्यासाठी दुसरी सुरक्षित जागा तिला तोवर सापडली नसावी किंवा शोध घेण्यासाठी
पुरेसा वेळ मिळालेला नसावा. दिवसभरात चिपळूण शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या
कचरा डेपो परिसरातल्या छोट्याश्या पाणवठ्यावर एका जेसीबी ऑपरेटरलाहीआज बिबट्या
दिसला होता.
सहाव्या दिवशी, १६ तारखेला ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं असता
आदल्या रात्री १ ते ३ वाजेपर्यंत मादी बिबट्या पिल्लं असलेल्या बॉक्सजवळ बसून
राहिली असल्याचे दिसले. तेव्हा ती अधून मधून इकडे तिकडे आजूबाजूला न्याहाळत राहिली
होती. काहीवेळ बॉक्सच्या भोवती गोल-गोल फिरत होती. मध्येच खोक्यात डोकावून
पिल्लांकडे पाहात होती. पण एवढं होऊनही पिल्लांना खोक्याबाहेर काढायचं तिने टाळलं
होतं. पण यामुळे मादी बिबट्या रात्रीची पिल्लांजवळ येत असल्याचं स्पष्ट झालं होतं.
म्हणजे जागेसाठी कुठेतरी तिची पाहाणी सुरु असणार हे निश्चित झालं. फक्त तिची ही
जागेची पाहाणी कोणाच्या निदर्शनास येत नव्हती. सलग दोन दिवस पिल्लं एकाच ठिकाणी
असल्याने ती सुरक्षित असावीत, हेही तिनं मान्य केलं असावं. स्वतः जागा शोधण्याच्या
निमित्ताने पिल्लांपासून लांब गेल्यावर तीही सुरक्षित आणि पिल्लंही सुरक्षित असं
तिचं काहीसं वेगळं दुर्मीळ वर्तन सध्या जाणवत होतं. टीमने सध्याच्या बॉक्सला आतून आणि
वरून गोणपाट लावलेले होते. त्याला वरती एका ठिकाणी थोडीउघडीक ठेवलेली होती. जेणेकरून
गोणपाट फाडून मादी बिबट्या सहज पिल्लांना बाहेर काढू शकेल. पण मागच्या २/३
रात्रीतील अनुभवामुळे तेही तिला अवघड ठरत असावं असं वाटल्याने आज टीमने अशा
मोहिमांत उपयुक्त ठरणारे भाजीपाल्यासाठी वापरले जाणारे दोन क्रेट आणले. क्रेट धुतले.
मादीला जवळपास कुठेही मनुष्यसदृश्य वास येऊ नये यासाठी क्रेटना माती लावली. पिल्लांची
हाताळणी करताना हँडग्लोव्ज वापरण्यात आले. एका क्रेटमध्ये तळाला पिल्लं ठेवण्यात
आली. दुसरा रिकामा क्रेट पहिल्यावर उपडी ठेवण्यात आला. त्यावर मादी बिबट्या वरचा क्रेट
सहज ढकलू शकेल एवढ्या वजनाचा दगड सुरक्षितेसाठी ठेवण्यात आला. सगळाच अभ्यास सुरु
होता. चिपळूण वन्यजीव अभ्यासक टीम यासंदर्भात राज्यातल्या तज्ज्ञांशी बोलत होती.
त्यातून या नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात होत्या. आज दिवसभरात सकाळी बैल घेऊन
शेतात जाणाऱ्या मंडळींना एक-दोनदा तर एकदा १/२ मुलांनी बिबट्याला पाहिलं होतं.
एवढे प्रयत्न करूनही सातव्या दिवशी, १७ तारखेला सकाळी येऊन
पाहिलं तेव्हा आदल्या रात्रीही मादी बिबट्या स्वतः पिल्लांजवळ येऊनही त्यांना सोबत
घेऊन गेली नव्हती. तेव्हाही ती क्रेटच्या आजूबाजूला फिरत राहिली. काहीवेळ क्रेटजवळ
बसून राहिली. आता दिवसभर पिल्लांजवळ न थांबता सायंकाळी मावळतीच्या वेळेस पाहाणीसाठी
यायचं टीमचं सर्वानुमते ठरलं. सायंकाळी टीम पोहोचण्यापूर्वी मादी बिबट्या क्रेटजवळ
बसलेली असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसले. मादी बिबट्याच्या निघून जाण्याच्या आणि टीमच्या
पोहोचण्याच्या वेळेत पाचेक मिनिटांचं अंतर होतं. हे असं दुसऱ्यांदा घडत होतं. मादी
बिबट्याच्या वावरावरून ती सुरक्षित जागा शोधत असल्याच्या निर्णयाप्रत सारे आले. मादी
बिबट्या पिल्लांना नक्की नेईल असा विश्वास वाटू लागला. पिल्लांना पुन्हा दूध
पाजण्यात आलं. त्यांची तपासणी करण्यात आली. टीमने पिल्लांची जागा आणि क्रेट बदलण्याचा
निर्णय घेतला. यावेळी रोजच्या जागेपासून साधारणपणे १० फूट अंतरावर जाणवलेल्या
विणीच्या जागेवर एकावर एक रचलेल्या वीटांचे पेटी सदृश्य आकाराचे कच्चे बांधकाम करण्यात
आले. त्यात दोन्ही पिल्लांना ठेवण्यात आले. वीटांच्या बांधकामाचा वरचाभाग मोकळा
आणि जवळपास नैसर्गिक वाटेल असा साकारलेला होता. नव्याने दोन ट्रॅप कॅमेरे सेट करण्यात
आले. रात्री काहीवेळ सुरक्षित अंतरावरून पाहाणी करण्यात आली.
आठव्या दिवशी, १८ तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा दोन्ही
पिल्ले विटांच्या कच्च्या बांधकामात आढळून आली नाहीत. ट्रॅपकॅमेरा बंद पडलेला होता.
मादी बिबट्या आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित अधिवासात रवाना झाली होती. दोन्ही
पिल्लं चालणारी असल्याने तोंडातून नेण्याची आवश्यकता नव्हती. विषयाची खात्री
करण्यासाठी पुढील २/३ दिवस टीमने निरीक्षण केले. मादी बिबट्या, तिची पिल्लं दिसली
नाहीत. मादीने आपल्या पिल्लांना सुरक्षित सोबत नेल्यावर शिक्कामोर्तब झाले. चिपळूणला
वन विभागात दोन ट्रॅप कॅमेरे उपलब्ध होते. रत्नागिरीतूनही आणखी कॅमेरे मागविण्यात
आले होते. शेवटीशेवटी भौगोलिक स्थितीनुसार प्रत्यक्ष जागेवर तीन कॅमेरे लावण्यात
आले. प्रत्यक्षात दोन कॅमेरे अचानक बंद पडले. एक जो कॅमेरा चालू होता त्यात
कोणताही क्लिक मिळाला नाही, अर्थात तोही कॅमेरा खराब झाला होता. शेवटच्या क्षणी
ट्रॅप कॅमेरा बंद पडल्याने शेवटच्या क्षणाचे डिटेल्स टीमला मिळवता आले नाहीत. नवीन
जागी पिल्लांसह आल्यावर वन्यजीव शक्यतो जागेवरून हलत नसतात. मागच्या पाचेक दिवसात मादी
बिबट्या काहीतरी व्यवस्थित खाऊन आलेली असावी. अशात पुढचे सलग २/३ दिवस एका ठिकाणी
थांबण्याची क्षमता या वन्यजीवात असते. दोन पिल्लांना दूधाशिवाय अन्य काही खायला
देऊन चालणारं नव्हतं. त्यामुळेच मादी बिबट्या दिसली नसावी.
एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टमधील हेलिकॉप्टरच्या रनवेवर ५
फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जोरजोरात डरकाळ्यांचा आवाज ऐकू
आल्याने मादी बिबट्या तिथून चालत गेली असावी अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली
होती. ‘मादी बिबट्या पिल्लांना घेऊन फिरते आहे का ?’ हे पाहाणे वन्यजीव
अभ्यासकांसाठी महत्त्वाचे होते. अर्थात दिसणारी मादी बिबट्या ही तीच !’ असं लगेच
म्हणणंही धाडसाचं ठरणारं होते. पण तरीही मादी बिबट्याच्या सोबतीला तिची दोन्ही
पिल्लं असतील तर कदाचित ओळखणं सोपं जाईल असं टीमला वाटतं होतं. मादीने आपल्या
बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर जवळपास दोनेक आठवडे ही मंडळी, मादी-पिल्लांना
जगण्यात पुन्हा काही अडचण तर आलेली नाही ना ? या कारणाने त्यांच्या शोधात राहिली. पण
मादी दिसली नाही. काही ठिकाणी पाऊलखुणा मात्र सापडल्या. पण त्या तिच्याच कशावरून ?
हाही प्रश्न होता. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सकाळच्या वेळेत श्रीविठ्ठलाई
मंदिरापलिकडे असलेल्या कचरा डेपोदरम्यानच्या जागेत पहिल्यांदा मादी बिबट्या आणि
पाठोपाठ एक पिल्लू पाहाण्यात आलं. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शेंबेकर
यांच्या बागेच्या खालच्या बाजूला असलेल्या जंगलसदृश्य गवताळ जमिनीवर कोणीतरी
लोळलेलं निदर्शनास आलं. तेव्हा त्या परिसराची पाहणी केली असता अर्ध्या तासाने
बिबट्या मादी आपल्या दोन पिल्लांसह कचरा डेपोच्या दिशेने चालत जाताना दिसली. या
दोन्ही नोंदी प्रत्यक्षदर्शी निलेश बापट यांनी केल्या. शेंबेकर यांचे बागेतील
कामगार कांबळी यांनीही मे महिन्याच्या अखेरपर्यंत तीन वेळा मादी बिबट्याला
पिल्लांसह पाहिल्याचे सांगितले. मादी बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर धामणवणे
गावातून माहिती घेतली असता गावातील ३/४ कुत्रे गायब असल्याचे समोर आले. या भागातील
लोकांची पावसाळापूर्व शेती वगैरेची कामे नियमित सुरु होती. मात्र बिबट्याने कुणाची
गाय वगैरे मारल्याची नोंद झालेली नव्हती. मादी बिबट्या ही कदाचित या भागातल्या
चिपळूण कचरा डेपोवर पोसलेली कुत्री आणि क्वचित प्रसंगी मिळणारं भेकर मारत असावी, असे
अनुमान काढण्यात आले.
मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लांची ही भेट घडवण्यासाठी कोल्हापूरचे
मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमंट बेन, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, उपविभागीय
वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, कोळकेवाडीचे
वनरक्षक राजाराम शिंदे, चिपळूणचे वनपाल किशोर पत्की, रामपूरचे वनरक्षक दत्ताराम
सुर्वे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश
बापट, ओंकार बापट, अॅड. चिन्मय दीक्षित, रोहन शेंबेकर आदिंनी परिश्रम घेतले. सह्याद्रीच्या
मुख्य रांगेपासून आत आलेल्या चिपळूण नजीकच्या डोंगररांगेत असा प्रयत्न पहिल्यांदाच
होत असल्याने विशेष काळजी घेण्यात आली होती. जुन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल
बनगर, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक आणि बिबट्याच्या अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय यांचेही
यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.
बिबट्या अंगावर आला तर माणसाच्या मांडीला चावा घेऊ शकतो. कारण
आपली मांडी ही चालताना त्याच्या तोंडाजवळ येत असते. तो मांडी बाद करू शकतो, पंजा
मारू शकतो. म्हणून अशा वेळी हाता-पायावर क्रिकेटसारखे पॅड, मानेला कॉलर, डोक्यावर
हेल्मेट असलेला विशिष्ठ पेहेराव करून वावरावे लागते. टीममधल्या एक-दोघांनी तो
ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसवर असताना बिबट्याने हल्ला केला तर माणूस
दगावण्याचा धोका कमी होतो. यातल्या पॉवरपॅक हेल्मेटमुळे बाहेरचा आवाज येत नसतो. ड्रेसमुळे
हातापायाच्या हालचालीवर परिणाम होत असतो. त्यामुळे टीममधले सगळेजण तो ड्रेस घालत नसतात.
वन्यजीवाने हल्ला केला तर त्याला हाकलणे हे पहिले काम असते. म्हणून इतरांच्या
हातात, जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून वापरली जाणारी फेसशिल्ड आणि काठ्या असतात,
त्या यावेळी वापरण्यात आल्या. टीममधला एकजण दूर उंचीवर उभा राहून ‘वॉचटॉवर’ सारखा
कक्षेतल्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून होता. धामणवणेतील मादी बिबट्याचा हा विषय
खूप गुप्त ठेवण्यात आला होता. गावातल्या विचारणाऱ्या माणसांना नीटसं सांगितलं गेलं
नव्हतं. अन्यथा विषय जिकडेतिकडे पसरून लोकांची गर्दी वाढली असती. प्रत्यक्ष काम
करताना त्रास झाला असता. ४/५ वर्षांपूर्वी चिपळूण गुहागर मार्गावरील उक्ताडला भेकर
आणि नंतर एकदा बिबट्याचं पिल्लू मिळालेलं होतं. तेव्हा शेकडोंचा जनसमुदाय जमा
झालेला होता. आपल्याकडे एखादा साप किंवा अजगर मिळाला तरी अशीच अवस्था असते. पिल्लं
सोबत असताना कोणतीही वन्यजीव मादी आक्रमक असते. ती इतरांना त्रास देऊ शकते. या
निकषाचा विचार करता प्रस्तुत घटनेतील मादीच्या घरा-दारात आठवडाभर टीमची सारी मंडळी
वावरत राहिली. तरीही मादी बिबट्याने यांच्यातल्या कोणालाही त्रास दिला नाही. स्वतःलाही
त्रास करून घेतला नाही. पिल्लांना दूध पाजलं नाही. ज्या पट्टयात हे घडलं त्या धामणवणे
भागात क्वचित प्रसंग वगळता अनेकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिलेला नव्हता. २
वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात धामणवण्यात मादी बिबट्या फासकीत अडकलेली होती. त्यानंतर
गेल्या २ वर्षात बिबट्या कोणालाही दिसलेला नव्हता किंवा बिबट्याची माणसासमोर यायची
वेळ जुळलेली नव्हती. बिबट्या काय किंवा जंगलातले अन्य वन्यजीव काय ? ते माणसांच्या
हालचाली दुरून पाहात असतात. माणसाची चाहूल लागताच सावध होतात. सुरक्षित ठिकाणी कॅमॅफ्लॉज
होतात. जो वन्यजीव माणसासमोर येत नाही किंवा अनेक दिवसात आलेला नाही तो
प्रस्तुतच्या घटनेप्रमाणे स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने मनुष्यासमोर येणं टाळतो, असं
मत निलेश बापट यांनी नोंदवलं.
संपूर्ण कोकणाला जैव विविधतेतील विविध परिसंस्थांची
निसर्गदत्त देणगी लाभली आहे. पट्टेरी वाघासह बिबट्या, रानडुक्कर, माकड, उदमांजर, खवले
मांजर, रानगवा, सांबर आदी सस्तन प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुलपाखरे, मगरीसारखे
उभयचर प्राणी, सरीसृप वर्गातील प्राण्यांचा येथे आढळ आहे. इथल्या अति वनाच्छादित
क्षेत्रात आव्हानात्मक सेवा बजावणे हे नेहमीच शासन प्रतिनिधी आणि वन्यजीव
अभ्यासकांसाठी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारे ठरते. कोकणातले
वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सामुदायिक समन्वयाच्या माध्यमातून स्थानिक
वन्यजीव अभ्यासकांच्या साहाय्याने अनेकदा आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडतात. यातला
बिबट्या हा प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतो आणि मानव-वन्यजीवांच्या
संघर्षाला तोंड फुटते. हे आपण नेहमी वाचतो, दूरचित्रवाहिन्यांवर पाहातो. खरंतर हा संघर्ष
घडावा असं कोणाच्याही मनात नसताना ते घडतं. पण याच निसर्गात ‘वन्यजीव संवर्धन
मोहीम’ही यशस्वी होत असतात. समाज म्हणून आपण सर्वांनी त्याकडेही डोळसपणे पाहायला
शिकायला हवंय. विशेषत शासकीय वन्यजीव संवर्धन मार्गदर्शक तत्त्व प्रणालीस अधीन
राहून, कमालीची गुप्तता पाळून एखादी मोहिम यशस्वी केली जाते तेव्हा ती मानव आणि
वन्यजीव यांमधले सकारात्मक नात्याचे नवे दोर विणण्याचा प्रयत्न करत असते. धामणवणे
येथील घटनेतील मादी बिबट्याच्या वर्तणुकीतील अनोख्या वत्सलभावनेच्या नोंदीने हेच
काम केले आहे. ते समाजाने आणि सजग निसर्गप्रेमींनीआवर्जून समजून घ्यायला हवे आहे.
अशा कामांचं यश हे टीमच्या संयमावर अवलंबून असतं. एखादी टीम
दुसऱ्याच दिवशी कंटाळली आणि त्यांनी ‘फिमेल मेलेय !’ असं रिपोर्टिंग वन खात्याच्या
वरिष्ठांना केलं तर हा सगळा विषय संपू शकला असता. पिल्लांची रवानगी कधीच बाहेर न पडण्याकरिता
जुन्नर किंवा बोरिवली अनाथालयात झाली असती. पण या टीमच्या सक्रीयतेमुळे असं चुकीचं
काही घडलं नाही. दुसरं असं की श्रीविठ्ठलाई मंदिराकडचं पिल्लू प्रकाशात आलं नसतं
तर कदाचित सारी टीम श्रीविंध्यवासिनी मंदिराजवळ नियमानुसार आठवडाभर बसून राहिली
असती. सरतेशेवटी कदाचित काहीही हाती लागलं नसतं. सुरवातीला ४/५ दिवस होऊनही मादी
बिबट्या पिल्लांना नेत नव्हती. अशा स्थितीत शासनाचे आठवडाभराचे असलेले एस.ओ.पी.चे
नियम खूप चांगले आहेत. आपण निसर्गात कार्यरत सर्वांनी ते न थकता संयमपूर्वक पाळायला
हवेत, हे या घटनेतून सिद्ध झालं.
प्रस्तुतची मादी बिबट्या सुरक्षित जागेसाठी धडपडत होती. ती
पिल्लांजवळ यायची, त्यांना बघायची. काही काळ थांबायची आणि परत फिरायची. पिल्लांजवळ
एखादा कुत्रा किंवा गाय गेली असती तर तिने नक्की हल्ला केला असता. पण माणूस
म्हटल्यावर तिलाही काहीशी भिती वाटली असावी. अर्थात हाही तर्क आहे. कारण मादी
बिबट्याचं असं वर्तन आजवर कोठेही आढळून आलेलं नाही. पिल्लं असताना मनुष्यासह
कोणीही मादीच्या कक्षेत जाण्याचा प्रयत्न केला तर मादी आक्रमक होते असाच वन्यजीव
शास्त्राचा अनुभव सांगतो. त्यामुळे मादी बिबट्याने असं दुर्मीळ वर्तन का केलं
असावं ? याबाबतचे अनेक तर्क आपण समजून घेतलेत. तरीही या मागचं निश्चित कारण ती
मादी बिबट्याच आपल्याला सांगू शकेल.
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी
रोड, खेण्ड,चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,
ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २४ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
कोकण पर्यटन आणि डिजिटल विश्व
शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची गती ही समुद्रकिनाऱ्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. ‘डिजिटल लाईफस्टाईल’ हाही असाच एक बदल आहे, तो कोकणने स्वीकारलेला दिसतो. ‘डिजिटल लाईफ’चं मूळ अधिकाधिक व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे कोकणने ‘आमची शाखा कुठेही नाही किंवा जेवणाची काय ती एकदाच ऑर्डर द्या किंवा कोकम सरबताच्या कितीही बाटल्या घ्या, चव बदलणार नाही आणि पैसेही कमी होणार नाहीत’ या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. तरच ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेल्या ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये कोकण पर्यटनाला टिकाव धरता येईल.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इंटरनेट, संगणक आणि मोबाईलद्वारे आपली उत्पादने आणि सेवांचे विपणन अर्थात मार्केटिंग करणे तुलनेने गतिमान झालेले असले तरी त्याचे चांगले-वाईट परिणामही त्याच वेगाने पसरत असल्याने हे तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे आहे. त्यामुळे याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर व्हायला हवा आहे. कोकण पर्यटनात काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेलं ‘डिजिटल मार्केटिंग’ शिकलं पाहिजे. आपण डिजिटल युगात जगत आहोत. मे २०१९ च्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या ७७० कोटी असताना ४४० कोटी लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. सरासरी दोन तास या प्रमाणे ३५० कोटी लोक सोशल मीडिया वापरत होते. गुगल सर्चइंजिनवर प्रत्येक सेकंदाला ४० हजाराहून अधिक सर्च यायचे. यातले ६० टक्क्याहून अधिक सर्च मोबाईलवरून व्हायचे. फेसबुकवर प्रत्येक सेकंदाला ६ नवे प्रोफाईल निर्माण होत होते. त्याच ठिकाणी ६ करोड हून अधिक अॅक्टिव्ह पेजेस होती. साधारणपणे ३०० तासांचे व्हिडिओ युट्युबवर प्रत्येक सेकंदला अपलोड होत होते. इंस्टाग्रामवर दर महिन्याला ८० करोड लोक अॅक्टिव्ह होते. ही आकडेवारी वाढत जाणारी आहे. आजचा ग्राहक डिजिटल आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांनाही अधिकाधिक ‘डिजिटल’ व्हावे लागणार आहे. पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध असलेल्या Shopping, Ticket and Room Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Job searching आदि बऱ्याच बाबी डिजिटल होत आहेत. इंटरनेटच्या या सर्वव्यापी ट्रेंडमुळे पर्यटन व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचा वाटा खूप मोठा राहाणार आहे. एका अभ्यासानुसार तंत्रज्ञान वापर करणाऱ्यांपैकी ७० हून अधिक टक्के लोकं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्याआधी ऑनलाईन, फिरायला बाहेर पडण्याआधी माहिती घेत असतात. त्यामुळे जगाच्या डिजिटल बाजारात आपली ‘कोकण’ म्हणून दमदार आणि देखणी उपस्थिती असायला हवी. डिजिटल दुनिया ही आपल्याला कोकण म्हणून ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवते. ग्राहकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करते. ती आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्यासाठी उपयुक्त आहे. कोकणातील पर्यटन निगडीत उत्पादने आणि व्यावसायिकांनी आपल्या सेवांची ऑनलाईन जाहिरात करायला हवी आहे. Video Marketing, ईमेल मार्केटिंग हीही काळाची गरज आहे. डिजिटल जमान्यात Content Marketingला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या कोकणातील पर्यटन निगडीत व्यवसायाविषयी व्यक्त होताना पुरेशी काळजी घ्यायला हवी आहे.
आपल्या देशात इंटरनेट प्रभावी झालं तेव्हा डिजिटल मार्केटिंग काही लोकांपुरते मर्यादित होते. सोशल मिडिया प्रभावशाली झाल्यावर ते सामान्यांना खुले झालेले आहे. त्याचा नीट उपयोग करून घेणे ही कला असून ती आपण आपल्या आवश्यकतेनुसार शिकायला हवी आहे. आजही कोकणात महामार्गावर बहुतांशी हॉटेलात टिपीकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही. पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात तर प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी ? आणि कसे ? यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. सावंतवाडीतील लाकडी वास्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमीपुत्रांची पाऊले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात. येत्या काही वर्षात साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यास रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नातून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो डिजिटल असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाईल्डलाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाईल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटरपार्क, थीमपार्क आणि सर्वात महत्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राईड सारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रीय करत त्याचे डिजिटल मार्केटिंग करून कितीतरी समृद्धी आणणे शक्य आहे. अर्थात पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा काळजीपूर्वक सांभाळला जायलाच हवा ! आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्क कल्चर नाही. सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरात नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खाजगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोकं ‘सेकंड होम’ एन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी आम्हाला डिजिटल सक्षम व्हावे लागेल. आपली संस्कृती ‘अतिथी देवो भव’ म्हणत असल्याने डिजिटल जाहिरातीतून आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये कोकण दिसायला हवे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते. पण तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? इथे अजून डिजिटल मार्केटिंग हवे आहे.
कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल. डिजिटल प्लॅटफॉर्म इथे उपयोगी पडेल, पडतो आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची डिजिटल दृष्टी विकसित व्हायला हवी. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची पडायला हवा आहे. चिपळूणच्या ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी’साठी आम्ही ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड’च्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. ‘डेस्टिनेशन चिपळूण’ सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला. पण सतत याला येणारा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहिला. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी निधी लागणार आहे. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी.
कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला ‘थीम्स’ भेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं डिजिटल मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.
कोरोना पश्चात अख्खं जग ‘रिव्हेंज (रिस्क) टुरिझम’साठी तयार झाले आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकणही यासाठी तयार आहे. शासनाने कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ या इथल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोकणातलं कौलारु घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाची, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट इकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या हृदयात उतरायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढऱ्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते ? हे अजून कितीकाळ शब्दातच सांगायचं ? कोकण पर्यटनातील सर्व उद्योग, पर्यटन सुविधा आदिंची माहिती एका क्लिकवर आणण्यासाठी सोशल मिडीयावर शेकाडोनी ग्रुप्स कार्यरत आहेत. यांद्वारे जमा होणारा ‘डेटा’ ही आजच्या ‘डिजिटल लाईफ’मध्ये सर्वात मोठ्या संपत्ती प्रमाणे आहे. तिचा उपयोग ‘कोकण पर्यटन’ म्हणून काळजीपूर्वक व्हायला हवा आहे. कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा डिजिटल मार्केटिंगवर खर्च करतो ? हे फार महत्त्वाचे आहे. व्यवसायासाठी हा खर्च व्हायला हवा आहे. डिजिटल जीवन शैलीतील माध्यमांचा सर्वोत्तम उपयोग करून कोकण पर्यटन वृद्धी शक्य आहे.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८,
कोयनेच्या जंगलातील व्याघ्रदर्शन
पूर्वीच्या कोयना अभयारण्यामध्ये (सध्याचे सह्याद्री टायगर रिझर्व्ह)
पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना सुरु झाली, तेव्हाची घटना. आपल्या जंगलांना प्राणीगणना नवीन नाहीत, त्या पूर्वीही व्हायच्या. २००८ पर्यंत प्राणीगणनेत भरपूर फिरायचं, हिंडायचं, जंगलं अनुभवायचं असं चालायचं. फॉरेस्ट
गार्डस्, वनमजूर, पर्यावरणप्रेमी,
वन्यजीव अभ्यासक आदी मंडळी एकमेकांजवळ माहितीचं, अनुभवांचं आदानप्रदान करायचे. कोयनेच्या जंगलासाठी महाराष्ट्र शासनाकडून
पहिल्यांदा २००९ मध्ये शास्त्रीय प्राणीगणनेचे आदेश आले. २०१० साली ही शास्त्रीय
प्राणीगणना निश्चित झाली. त्यावेळी कोयनेच्या घनदाट जंगलात रत्नागिरी जिल्ह्याचे
मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या बावीस मीटर
अंतरावरून ऑनफूट वाघ पाहिला होता. जंगलातल्या त्यांच्या चित्तथरारक अनुभवाची ही
कहाणी आहे.
सर्वाधिक घनदाट म्हणून प्रसिद्ध असलेले कोयनेचे अभयारण्य हे पश्चिम
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर
जलाशयाच्या साथीने पसरलेले आहे. शिवकालीन इतिहासापासून जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध
असलेल्या या अभयारण्याला जलाशयाची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. या जलाशयाच्या पश्चिमेकडील
बाजूचा अभयारण्याचा बहुतांश भाग घनदाट आहे. या अभयारण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीची
मुख्यरांग आणि दुसऱ्या बाजूच्या उपरांगेमधून कोयना नदी वाहते. महाराष्ट्रातील दुसऱ्या
क्रमांकाचा उंच ‘बाबू कडा’, अभयारण्यातील सर्वोच्च वासोटा किल्ला या जंगलात आहे. दमट
विषववृत्तीय सदाहरित जंगलात वर्षाला सरासरी ५००० मि.मी. पाऊस पडतो. पश्चिम
महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता असलेल्या अशा या अभयारण्यात पहिल्यांदा
शास्त्रीय प्राणीगणना होणार होती.
नियोजनानुसार गार्ड, फॉरेस्टर
किंवा वनपाल यांचेकडून विविध बीटातील सहभागी सदस्यांना ठराविक जंगल क्षेत्रातील
सर्वात महत्वाच्या भागात किमान हजारभर आणि कमाल दोन हजार मीटरच्या ट्रॅन्झॅक्ट
लाईन टाकून तिचे २०० मीटरचे तुकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डेहराडूनच्या
भारतीय वन्यजीव संस्थेने ही ट्रॅन्झॅक्ट मेथड लाईन (रेषा विभाजन पध्दती) विकसित
केलेली होती. उत्तम नोंदींकरिता ओढ्या-नाल्यांना क्रॉसलाईन टाकली जाणार होती. प्राणीगणना
करणाऱ्या टीम सोबत एक फॉर्म दिला जाणार होता. त्यात जंगलांचे आच्छादन, एक हजार मीटर ट्रॅन्झॅक्ट लाईनचे दोनशे मीटरचे तुकडे केल्यावर त्या
प्रत्येक तुकड्यातील महत्त्वाच्या माहितीची नोंद होणार होती. जंगलातील पायवाटांच्या
दुतर्फा चौकोन, काही ठिकाणी वर्तुळं आखली जाणार होती. एखादा प्राणी डावीकडून
उजवीकडे किंवा उलट दिशेने पाणवठ्याकडे गेला आहे का ? जंगल वाटांवरून खाली किंवा
खालून वर प्राणी गेला आहे का ? प्राण्यांच्या विष्ठा कोणत्या
भागात मिळत आहेत ? आदी प्रत्यक्ष पाहिलेल्या नोंदी फॉर्ममध्ये
करून वन्यजीवांचा अंदाज घेतला जाणार होता. तेव्हा आजच्यासारखे कॅमेरा ट्रॅप नव्हते.
वाघ किंवा बिबट्याच्या पायाचा ठसा मिळाला तर प्लॅस्टर कास्टिंग करून ठशाचे
मोजमाप घेतले जाणार होते. एखादा ठसा साधारणत साडेसहा पावणेसात इंचापेक्षा अधिक
असल्यास तो वाघाचा असल्याची शक्यता बळावणार हे नक्की होतं. एखादा ठसा थोडा छोटा
असला तरी बिबट्या आणि वाघाच्या पिल्लाचा ठसा यातला भेद समजू शकणार होता. ही प्राणीगणना
करताना पहिल्या दिवशी शाकाहारी प्राण्यांचा सर्व्हे, दुसऱ्या दिवशी मांसाहारी
प्राणी, तिसऱ्या दिवशी वर्तुळासारख्या केलेल्या
मार्किंगमधील विष्ठा पाहिल्या जाणार होत्या. पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे समजणारे
आवाज नोंदवले जाणार होते. चौथ्या दिवशीपासून सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
प्रत्यक्ष जंगल गस्त (पायदळ) सुरु होणार होती. प्रत्येक दिवसाचा दुपारचा शिधा सोबत
घेण्याच्या सूचना होत्या. पायदळीतून एका जंगलाच्या मोठ्या पट्यातील कोणत्या बीटात
कोणते प्राणी दिसताहेत ? पायांचे ठसे, कोणत्या
प्राण्यांचे आवाज येत आहेत ? प्राण्यांच्या भ्रमणानुसार एका
बीटातून दुसऱ्या बीटात जाण्यासाठी काही जवळचे मार्ग आहेत का ? एखाद्या प्राण्याची विष्ठा मिळाली तर ती ताजी आहे का ? की आठवड्याभरापूर्वीची आहे ? आदी नोंदींच्या आधारे
संपूर्ण जंगलाची माहिती संकलित करण्याचे नियोजन होते. विष्ठा आदी गोळा करायला
पुरेसी साधने, लिहायला लेटरपॅडसोबत असणार होती. वन्यप्राणी, वन्यपक्षी,
ठिकाणचे नाव आदी दहाएक नोंदी केल्या जाणार होत्या. जंगलात
महत्वाच्या ठिकाणी, पाणवठ्यावर प्राण्यांच्या पायांचे उमटलेले
ठसे चटकन कळावेत, प्लॅस्टर कास्टिंग चांगलं व्हावं या
दृष्टीने मातीच्या चौकोनात, पीआयपी (पगमार्क इम्प्रेशन पॅड)
अर्थात अगदी पुळण (वस्त्रगाळ) माती तयार केली जाणार होती. इम्प्रेशन पॅडमुळे
जंगलात गस्त करताना अचूक माहिती मिळायला मदत होणार होती. मागील ८/१० वर्षांपेक्षा
ही प्राणीगणना काहीशी वेगळी होती.
कोयना धरण ते नदीचा उगम हे अंतर सत्तरेक किमी असावे. जलाशयाभोवती किमान शंभरएक
गावे वसलेली आहेत. देशातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र ‘खिरखंडी’ इथेच
आहे. गावांचे दळणवळण लाँचसेवेवर अवलंबून आहे. संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता
असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. कोयनेचा
जंगलातील भूप्रदेश अत्यंत रमणीय आहे. सह्याद्रीच्या अवघड भौगोलिक रचनेमुळे इथे
रस्ते नाहीत. जंगलात असंख्य खोरी आहेत. त्यातल्या झुंगटी, पाली, मालदेव, रोहिणे, करंजावडे,
शिरशिंगे, झाडोली, डिचोली, किसरुळे, आंबेघर, आंबेगाव आदी
पंधराएक गावांची बीट (खोरी/उपखोरी)तयार केली होती. या बीटातील टीमना ८४ हेक्टर, ९० हेक्टर अशी जंगलांची विभागणी करून देण्यात आली होती. प्रत्येक
बीटात एक फॉरेस्ट मजूर किंवा गार्ड, बाकीचे तिघे पर्यावरण प्रेमी, सामाजिक
संस्थांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आदी चार सदस्य सहभागी होते. संपूर्ण
जंगलातल्या झुंगटी, पाली, मालदेव या
बीटात वन्यजीवांच्या हालचाली तुलनेने अधिक असल्याची प्राथमिक माहिती होती. ऐकीव
माहितीनुसार जंगलातील आडोस-माडोसपासून बामणोली पर्यंतच्या भागात पट्टेरी वाघाचा
वावर होता. पट्टेरी वाघ अगदी चकदेव-परबत पर्यंत फिरायचा.
निलेश बापट यांचा समावेश असलेल्या बीटमध्ये, तीसेक वर्षे कोयनेच्या जंगलात
मजूर म्हणून वावरणारे बापू गुरव हे जंगलातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होते.
मध्यम उंची, काळ-सावळा रंग,
प्रौढत्वाकडे झुकलेली पण काटक शरीरयष्टी, कंबरेला कोयता आणि अर्धेअधिक टक्कल
पडलेल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांचे धनी बापूंचा जन्म कोयनेच्या जंगलातला.
जन्मापासून रात्री-अपरात्री जंगलातून चालायची सवय असल्याने त्यांना इथल्या सगळ्या
वाटा माहित. कोयना भागात कोणीही अधिकारी आले तरी ते जंगल फिरताना बापूंना हमखास सोबत
न्यायचे. कोयनेच्या जंगलाला वाहून घेतलेल्या बापूंचे योगदान इतके मोठे की आजही
कोयनेच्या जंगलात काही ठिकाणी बापूंच्या फोटोची पूजा केली जाते. बापट यांच्यासारखे
अनेक वन्यजीव अभ्यासक बापूंकडून बारकाईने जंगल वाचायला शिकलेले. तर असे हे बापू आपल्या
बीटात असावेत असं प्रत्येकाला वाटायचं. निलेश आणि बापूंच्या बीटात तेव्हा चिन्मय
ओक आणि आदित्य जोशी हे दोघे अन्य पर्यावरणप्रेमी होते.
आजचा पहिला दिवस हा सर्वांना विविध बीटाच्या भागात सोडण्यात जाणार होता. कोण
कोणाच्या बीटात यांची नोंद आणि शिधावाटप वगैरे होऊन सगळ्यांना घेऊन कोयना धरणाच्या
जवळून भन्नाट वाऱ्याच्या साथीने महाराष्ट्र शासनाची वनराणी लाँच निघाली. लाँचमधल्या
काही जणांचे ट्रेनिंग झालेले होते. ट्रेनिंगमध्ये वाघाच्या ठश्यांचे प्लॅस्टर कास्टिंग
कसे करायचे ? ठसे कसे मोजायचे ? ते कागदावर कसे उतरवायचे ? आदी माहिती देण्यात आली
होती. जंगलात कोणत्याही प्रकारचे मद्यपान करायला बंदी होती. जंगलातील प्रत्येक
पानावर जंगलाचाच हक्क असल्याने तिथून काहीही बाहेर न्यायला परवानगी नव्हती. मानवी
गंध प्राण्यांना किमान १/२ किमीपर्यंत समजत असल्याने परफ्युम वगैरे वापरल्यास
वन्यजीव दिसणं अशक्य होईल. यास्तव ते न वापरणे, जंगलात एकटे-दुकटे विनाकारण न
फिरणे, जंगलात मोठ्याने बोलणे, हसणे टाळणे आदी सूचनांसह काच, लेटरपॅड, स्केचपेन,
मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे साहित्य आणि ७/८ किलो
तांदूळ, तेल, मसाला असा शिधा सोबत देण्यात आला होता. कोयनेतून सुटलेली लाँच सर्वांना
बीटनुसार सोडत पालीच्या खोऱ्यात पोहोचेपर्यंत सायंकाळचे ४ वाजले. पुढे ही लाँच कोयना
जंगलाची शेवटची रेंज असलेल्या ताकवली-मालदेव बीटापर्यंत पोहोचली. तिथून परत फिरून
बामणोलीला गेली.
बापू, निलेश, चिन्मय आणि आदित्य यांना लाँचनेज्या पालीच्या पट्ट्यात सोडले
तिथे धरणाच्या बॅकवाटरला लागून असलेल्या गर्द जंगलात एक तीन मजली सिमेंट
काँक्रीटचा वॉचटॉवर होता, अजूनही तो वॉचटॉवर आहे. वॉचटॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर या
चौघा मंडळींचा मुक्काम असणार होता. आवश्यकतेनुसार बॅटरी आणि चूल वगळता रात्रीच्या
अंधारात आकाशातील चंद्रकोर हाच काय तो प्रकाश सोबतीला होता. आपण जंगलात आहोत याची
सतत जाणीव करून देणारा रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज, अंगाला झोंबणारा गार
वारा आणि जलाशयातील पाण्याच्या लाटांच्या चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक आवाजाच्या
साथीने दिवस जाणार होते. सह्याद्रीची पर्वतरांग, घनदाट जंगल, हिवाळ्यात दिसणारे हिरवेगार डोंगर, जंगलातील पायवाट, पाणवठा, वन्य
प्राण्यांचा सहवास, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे,
औषधी वनस्पती अशा वातावरणात रात्री घालवण्यात थ्रिलिंग असणार होते. मंडळींनी
वॉचटॉवरच्या पायथ्याशी असलेल्या एका झाडानजीकची सवयीच्या जागेवरील चूल नीटशी केली.
उघड्यावर जेवण करायचं होतं. पाऊस आला तर आडोश्याला थांबायचं नक्की होतं. कोयनेच्या
जंगलात जानेवारीतही अचानक पाऊस भेटीला येत असल्यामुळे बचावासाठी सर्वांजवळ
प्लास्टिक होतं. कोयनेतला हा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरलाही पडत असतो. एप्रिल-मे
महिन्यात तो सुरुवात करतो. असं वातावरण असतं, आजही होतं. जलाशयाच्या
पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब या सर्वांचा उत्साह वाढवित होते. चुलीवरच्या
जेवणासोबत सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या. बघता बघता जेवणही आवरलं. झोपायची वेळ
झाली. वन विभागाचे ट्रेनिंग निलेशने पूर्ण केलेले होते. त्याने सर्वांना त्याची
माहिती दिली. त्यानुसार कामाची विभागणी करायला हवी होती. तेवढ्यात बापू बोलू
लागले, ‘तुम्हाला काय काय काम दिलंय ते तुम्ही बघा. मला काय त्यातलं समजत नाय ! मी
काय अनपढ ! मी तुम्हाला जंगल दाखविण्याचं काम करतो.’ रात्री अकरा-सव्वा अकराच्या
सुमारास सारे वॉचटॉवरवर आडवे झाले. झोपी गेले. सर्वानुमते प्राणीगणनेचे फॉर्म
भरायची जबाबदारी चिन्मयने घेतली. त्यासाठीचा नोटपॅड सदैव त्याच्यासोबत असणार होता.
जंगलमार्ग दाखवत जंगलाबाबतची समजेल ती माहिती बापू सांगणार होते. आदित्यकडे कॅमेरा
असल्याने त्याच्याकडे फोटोग्राफीची जबाबदारी होती. बापूंच्या सहकार्याने नोंदींशी
निगडीत साऱ्या बाबी तपासण्याचे काम निलेशकडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले.
मंडळींचा जंगलातून वाट काढत सुरु झालेला प्रवास त्यांना निसर्गाकडे घेऊन जाऊ
लागला. प्रवासातून पावलागणिक नवी उर्जा मिळू लागली. आज त्यांनी कोयनेच्या जलाशयावरती
आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या पाणवठ्यावरती बसून प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले.
दिवसभरात ऐकलेल्या पक्ष्यांच्या आवाजानुसार सायंकाळी नोंदी अपडेट केल्या. चुलीवरचं
आमटी-भाताचं जेवण सारे जेवले. बघता बघता असे दोन दिवस सरले.
तिसरा दिवस उजाडला. आज दिवसभर वाटेवर फिरायचं नियोजन होतं. प्राण्यांची विष्ठा,
वनाचे आच्छादन बघण्याचा आजचा दिवस होता. दिवसभरात सारीवाट फिरून सायंकाळी
वॉचटॉवरजवळ येऊन मंडळींनी नोंदी पूर्ण केल्या. तोवर अंधार पसरला. साधारणत
सात-साडेसातची वेळ असावी. कोयनेच्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं
प्रतिबिंब, पाण्याच्या लाटांवर उमटणारे त्याचे तरंग, जलाशया शेजारच्या भूपृष्ठावर
तयार झालेली लाटांच्या रेषांची नक्षी पाहात चुलीवर जेवण बनविण्याचं काम सुरु झालं.
मंडळींनी थोडी अधिक लाकडं जमवली. इतक्यात निलेशला लघुशंकेचा कॉल आला. तो जवळच्या आडोश्याला
गेला. हा जिथे उभा राहिला तिथवरच्या जागेत पायाखाली पाण्याच्या लाटांमुळे निर्माण
झालेल्या रेषांची नक्षी स्पष्ट जाणवत होती. निलेशला तिथे उभा राहता क्षणी पायाच्या
अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. चुलीपासून तसं जवळचं उभं
राहायचं असल्याने याने नेमकं तेव्हा पायात काही घातलेलं नव्हतं. काहीतरी
चावल्यासारखा फील येताच याने तिथेच एकदोनदा पाय झटकला. चुलीजवळ परत आल्यावर,
त्याने काहीतरी चावलं असल्याचं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा रात्रीचे आठ
वाजलेले. मग हे सारे बॅटरी घेऊन चावलेल्या जागी काही दिसतंय का ? म्हणून शोध घेऊ
लागले. जंगलात जमिनीवर साठलेल्या पालापाचोळ्याची चाचपणी करताना बॅटरीच्या उजेडात यांना
एक काळसर विंचू दिसला. ‘निलेशला काय चावलं असेल ?’ याचा सर्वांना अंदाज आला. आता तातडीने
काही हालचाल करावी म्हटलं तर जवळ लाँच नव्हती. वॉकीटॉकीही नव्हता. या बीटातल्या
चिन्मयकडे एक छोटा मोबाईल होता. पण त्याला जंगलात रेंज नव्हती. विचार करण्यात वेळ जात
होता. तोवर तिकडे काही मिनिटांनी निलेशचा पाय हळूहळू वरच्या दिशेने मुंग्या येऊन
सुन्न पडायला सुरुवात झालेली. बाकी मंडळी, ‘एवढ्याश्या विंचवाने निलेशला काहीही
होणार नाही’, म्हणत त्याची मानसिकता सकारात्मक ठेवण्याच्या प्रयत्नात होते.
इतक्यात चिन्मयला, त्याने आणलेल्या प्रथमोपचाराच्या साहित्यात सूर्यप्रकाश तेलाची
बाटली असल्याचं लक्षात आलं. विंचूदंशात या तेलाचा उपयोग नक्की होणार होता. त्याने निलेशला
हे तेल नाकात हुंगायला दिलं गेलं. विंचवाचा दंश झालेल्या जागेवर तेलाचे थेंब टाकायला
सुरुवात केली. विंचू चावलेला असल्याने सर्वांनी रात्रभर न झोपण्याचा निर्णय घेतला.
तोवर निलेशचा पाय गुडघ्यापर्यंत सुन्न पडत आलेला. आज त्याच्यासह सारे कसेबसे
टॉवरवर चढले. गप्पांसोबत सूर्यप्रकाश तेलाचा थेंब-थेंब उतारा रात्रभर चालू राहिला.
सकाळचे साडेचार वाजले. तेव्हा पायाला आलेला सुन्नपणा काहीसा कमी झाल्याचे
निलेशला जाणवले. आजच्या चौथ्या दिवशी ट्रॅन्झॅक्ट लाईन पार करून कोयना खोरे
फिरायला सुरुवात करायचे नियोजन होते. पालीच्या वॉचटॉवरमागून कोकण कड्यापर्यंत ही ट्रॅन्झॅक्ट
लाईन गेलेली होती. निलेशला आता फक्त अंगठ्याजवळ वेदना जाणवत होत्या. त्याने
शांतपणे विचार केला आणि सर्वानुमते पहाटे पाच वाजता पायात बूट चढवले. साडेपाच
वाजता कोकण कड्यापर्यंत जाणाऱ्या ट्रॅन्झॅक्ट लाईनच्या दिशेला लागणाऱ्या पहिल्या
चढाच्या दिशेने मंडळींनी चालायला सुरुवात केली. चढ चढल्यावर यांना एक माळरान भेटलं.
तिथे मोठं जंगल आहे. तेव्हा सकाळचे पावणेसात वाजले होते. तिथून पुढे एक पायवाट तिरकी
होते आणि समोरच्या जंगलातून खाली उतरून पुन्हा वर जाते. यातल्या खाली उतरणाऱ्या
वाटेवर मारलेल्या ट्रॅन्झॅक्ट लाईनला क्रॉस करून खालून वर आलेल्या अवस्थेत यांना
कोण्या वन्यजीवाचा किमान पावणेसात इंचाचा पगमार्क मिळाला. तो पगमार्क पाहताच बापू उद्गारले,
‘वाघरू (ढाण्या) फिरलंय इकडे कुठंतरी !’ बापूंचं बोलणं ऐकताच सर्वांचे डोळे
विस्फारले. तातडीने ठश्याचं प्लॅस्टर कास्टिंग केलं गेलं. तोवर सव्वा सात
वाजले. पुढे चालताना काही अंतरावर टप्प्याटप्प्याने जमिनीवर विशिष्ठ पद्धतीची उकरण
दिसून आली. कोयनेच्या जंगलात बापू वगळता इतरांसाठीहे नवीन होते. अजून थोडे
चालल्यावर सर्वांना कोकण कड्याच्या एक किमी अलिकडे उतारावरील वळणात एका
झाडावर विशिष्ठ स्क्रॅच मार्किंग दिसले. हे स्क्रॅच जवळपास बापूंच्या उंचीएवढ्या
अंतरावर केलेले होते. सारे निरीक्षण सुरु असताना मंडळींना जवळच कोण्या वन्यजीवाने लघुशंका
केल्याचे निदर्शनास आले. ती लघुशंकाही ताजी होती. जणू काही वेळापूर्वी केलेली ! बापूंनी
हे सारं क्षणार्धात ओळखलं. २०१० सालचा जानेवारी महिना संपत आलेला. २९ तारीख. कोयनेतल्या
कडाक्याच्या थंडीचे दिवस ते. जंगलात सर्वत्र धुकं पसरलेलं. लघुशंका पाहून निलेशने,
‘थंडीमुळे पानावरून पाणी गळलेले असेल’ अशी शंका बापूंना विचारण्याचा प्रयत्न केला.
पण बापू, ‘वाघ मुतलेला आहे’ या आपल्या मतावर ठाम राहिले.
आता मंडळी जंगलातल्या त्या अरुंद पायवाटेवरून सावध पावलं टाकत चाललेली. पुढे
एका टप्प्यावर यांना वन्यजीवाची विष्ठा मिळाली. पहिला पगमार्क आणि आत्ताची विष्ठा
यातलं अंतर पाऊणएक किमी असेल. मागचे सारे संदर्भ डोक्यात घोळू लागल्याने बापू
अत्यंत सावध झालेले. त्यांनी तशा सूचनाही इतरांना दिल्या. बापूंच्या मागे निलेश
चालत होता. नोंदी आणि छायाचित्रे घेत मागोमाग चिन्मय, आदित्य येत होते. सारेजण एका
वाटेवरून खाली उतरले तिथे यांना दोन-तीन मोठे दगड लागले. सर्वांना आता डोळ्यासमोर कोकणकडा
दिसत होता. आता इथून तिथवर पोहोचायला जेमतेम दहाएक मिनिटे अजून हवी होती. पाऊल
वाटेवरचे दगड पार करत असताना समोर बापूंचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले, ‘अरे वाघ
बसलाय ! वाघ बसलाय !’बापूंचे शब्द कानावर पडताच निलेशची नजर त्या दिशेला वळली.
निलेशला डोळ्यासमोर एक बऱ्यापैकी विस्तारलेलं आंजणीचं झुडूप दिसत होतं. अजूनही ते
झुडूप आहे. त्या झुडुपाच्या खाली पट्टेरी वाघ बसलेला होता. निलेशने अगदी हलक्या
आवाजात पाठीमागच्या चिन्मय आणि आदित्यला हाक मारायला सुरुवात केली. ते दोघे मागच्या
नोंदी करत आणि छायाचित्रे घेत सावकाश चालत येत होते. आवाज ऐकताच चिन्मय तसाच
धावला. तोवर इकडे पाठमोऱ्या बसलेल्या वाघाला निलेश आणि बापूंच्या हालचालींची चाहूल
लागली असावी. वाघ जागेवरून उठला. आंजणीच्या झाडामागून चालू लागला. तेव्हा चिन्मय या
दोघांजवळ पोहोचला होता. हा वाघ संपूर्ण कोकण कड्यावरती फिरलेला असावा, असा कयास
मंडळींनी बांधला. आंजणीच्या झाडामागून चालू लागलेल्या वाघाने काही अंतर कापल्यावर जवळच्या
उतारावर दोनदा जोरदार डरकाळी फोडली. दूरवर असलेल्या आदित्यने डरकाळीचा हा
आवाज ऐकला. बापू म्हणाले, ‘आता तो पुढे गेलाय. तो काय मागावर येणार नाही.’
पुढच्या तीनेक मिनिटात ही मंडळी पट्टेरी वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ पोहोचली.
वाघ निघून गेलेला होता. हातात असलेल्या गोल टेपनं मंडळींनी आपल्यातलं आणि वाघामधलं
अंतर मोजलं, तर ते होते अवघं २२ मीटर ! वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ एका वयस्क
गव्याची विष्ठा पडलेली होती. त्या विष्ठेच्या एका कोपऱ्यावर वाघाच्या पायाचा ठसा
उमटलेला होता. त्या वाघाच्या पायाच्या ठशाचे प्लॅस्टर कास्टिंग केले. त्या
ठशाच्या ठिकाणी चारही बाजूंनी दगड लावले. जवळच वाघाचीही विष्ठा मिळाली, यांनी तीही
ताब्यात घेतली. समोरच्या कोकण कड्यावर पोहोचल्यावर यांच्या मोबाईलला रेंज मिळाली. काही
महत्वाची नोंद मिळाली तर तातडीने संपर्क करण्याबाबतच्या काही सूचना सर्वांना पूर्वीच
दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर कुठेही संपर्क होईना म्हटल्यावर निलेशने
वन खात्याच्या कोयना कार्यालयात २८४४९२ या क्रमांकावर फोन केला. तोही फोन कोणी
उचलेना. शेवटी याने बामणोली फॉरेस्ट रेंजचे आर.एफ.ओ. दशरथ गोडसे यांना मोबाईल कॉल
केला. तुलनेने त्यांना या ठिकाणी लवकर पोहोचणे शक्य होते. त्यांचा मोबाईल कॉल
लागला. ते तेव्हा सातारा भागातील एका बीटात होते. निलेशने त्यांना कळवलं, ‘आमच्या
बीटात आज सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आम्ही प्रत्यक्ष वाघ बघितला. तुम्ही या. ’गोडसे
साहेबांनी निलेशचं बोलणं ऐकलं. म्हणाले, ‘तुम्ही जंगलात गस्त करत राहा. मी
सायंकाळी येतो.’
ही मंडळी सध्या उभी असलेल्या रस्त्यांनी खाली उतरलं की पाली आणि मालदेवच्या
मधलं घनदाट जंगल लागतं. तिथल्या एका जवळच्या ओढ्यापर्यंत जायचं यांनी आज पहाटेच ठरवलेलं.
आता अर्धा दिवस सरून गेलेला. दुपारचे साडेबारा वाजलेले. त्या पायवाटेवरून चालताना
ठिकठिकाणी यांना जणू डिसेंट्री लागल्यासारखी ताजी पातळ विष्ठा पडलेली दिसली. सुरुवातीची
काही मिनिटे, ‘ही विष्ठा कोणाची असेल ?’ याचा यांना नीटसा अंदाज येईना. तिथे
थांबून विचार केल्यावर थोड्या वेळाने बापूंच्या लक्षात आलं, ही विष्ठा अस्वलाची
होती. अंदाज लावून झाल्यावर सारेजवळच्या डुंग्यावर (छोटा डोंगर) पोहोचले. तेव्हा
बापूंचा अंदाज खरा ठरल्याची खात्री पटली. डुंग्याला लागून वाहात असलेल्या ओढ्याच्या
जवळपास अस्वलाचं एक पिल्लू फिरत होतं. बापूंनी ते पाहिलं. बापू सर्वांना ते पिल्लू
दाखवेपर्यंत पिल्लाच्या आणि मंडळींच्या डावीकडे आणखी एक पिल्लू आणि मादी अस्वलही
दिसलं. अस्वल हा जंगलातील वन्यजीवात सर्वात भयानक आणि बेभरवश्याचा प्राणी. त्याचा
हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. तो शिकार खात नाही पण फाडून टाकतो. स्वातंत्र्यापूर्वी
म्हैसूरच्या जंगलात एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने
आपल्या ‘ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. प्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांनी
‘मेळघाटी सातपुडा’ पुस्तकात, ‘मेळघाटातील
कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना
घाबरत नाहीत. परंतु आपल्याला जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना देवतांना करीत
धास्तावलेला प्रवास करतात’, असे लिहीले आहे. अर्थात प्रसंगावधान राखून बापूंनी
सर्वांना डुंग्याच्या दिशेने धावण्याचा आणि दगड गोळा करण्याचा सल्ला दिला. सारे
डुंग्यावर चढले. दगड गोळा केले. मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. तोवर अस्वल
आपल्या दोन पिल्लांसह डुंग्याच्या खालपर्यंत आलेली. मग यांनी जमवलेले २५/३० दगड
काही क्षणात खाली ढकलायला सुरुवात केली. डुंग्याखाली असलेली मादी अस्वल सुरुवातीला
जमिनीवर लोळत होती. इकडे तिकडे मान हलवित होती. दगड टाकण्याने ती तिथेच थांबली. या
मंडळींना वाघाच्या पाठीवर उंबराचं पाणी असलेल्या ज्या पायवाटेनं जायचं होतं नेमक्या
त्याच पायवाटेनं मादी अस्वल निघून गेली. म्हणून मग यांनी आल्या वाटेनं परत जायचा
निर्णय घेतला. डुंग्यासमोर यांना कोकणकडा आणि मालदेवमधील सह्याद्रीची हद्द दिसत
होती. मंडळींना तिथे पोहोचायला किमान अडीच तास लागावेत. मनुष्याच्या दृष्टीने
दूरवरच्या अशा ठिकाणापर्यंत ती मादी अस्वल यांच्या डोळ्यादेखत अवघ्या काही मिनिटात
पोहोचली. वन्यजीवांमध्ये किती ताकत असते ? मनुष्य त्यांच्यासमोर किती कमकुवत आहे ?
याची साक्ष पटविणारा तो अफलातून अनुभव होता. या दरम्यान कोकण कड्याच्या दिशेने
चालताना मादी अस्वलीने ४/५ वेळा मागे वळून आपल्या पिल्लांकडेही पाहिलं. हा अनुभव
गाठीशी जमा करून सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान मंडळी पालीतील लोखंडी वॉचटॉवरजवळ
पोहोचली.
सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी यांना वॉचटॉवरजवळ बसल्या जागी पट्टेरी वाघाची डरकाळी पुन्हा ऐकू आली. आवाजाच्या दिशेने अंदाज घेतला तेव्हा सकाळी फिरलेल्या पट्ट्यात अजूनही वाघ असल्याचे लक्षात आले. यांची नजर आता समोरच्या शिवसागर जलाशयावर स्थिरावली होती. सकाळी संपर्क झालेला असल्याने वन खात्याचे अधिकारी आत्ताच हे पाहायला पोहोचायला हवेत अशी निलेशची भावना झालेली. तेव्हढ्यात जलाशयात दुरून वनराणीलाँच येताना दिसली. लाँच जसजशी जवळ आली तसतसा तिचा आवाज कानाला जाणवू लागला. वाघाचा आवाज जिथून येत होता ते अंतर मंडळींपेक्षा लाँचमधील अधिकाऱ्यांच्या अधिक जवळ होतं. अर्थात लाँचमधील अधिकाऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू येणे अभिप्रेत होते. संजय पवार नावाचा लाँचचा ड्रायव्हर होता. त्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकल्यावर तत्काळ लाँचचं इंजिन बंद केलं. लाँचमधील गोडसे साहेबांना सांगितलं. पुढे ६ वाजून १० मिनिटांपासून साडेसहा वाजेपर्यंत १३ वेळा या भागात हा पट्टेरी वाघ ओरडला. त्याच्या डरकाळ्या सर्वांनी ऐकल्या. काळोख पडताना वनराणी लाँच पाली वॉचटॉवरजवळ पोहोचली. लाँचमधून उतरताच आर.एफ.ओ. गोडसे साहेब निलेशला म्हणाले, ‘आहे ! तुम्हाला वाघ दिसला हे खरं आहे. आम्ही लाँचमधून आवाज ऐकला.’ खूप आनंदी वातावरणात सर्वांचा गप्पांचा मूड जमलेला तेव्हा !
सहाव्या दिवशी सकाळी लाँच मालदेवला रवाना झाली. पाली बीटाची जबाबदारी असलेली ही
मंडळी काल वाघाचा आवाज आलेल्या जलाशया समोरच्या जंगलात आज फिरली. त्यांनी तिथले पट्टेरी
वाघाचे पगमार्क जमवले. दुपारी ३ वाजता मंडळी मालदेवच्या पठारावर पोहोचली. तेव्हा, मालदेव
बीटमधील मंडळींनीही पालीच्या दिशेला वाघ बघितलेला होता हे समजलं. मालदेवचे स्थानिक
शामराव कोकरे यांची म्हैस वाघाने मारली होती. शामरावांनी अनेकदा या भागात वाघ
बघितलेला होता. गाडीच्या टायरच्या सोलांच्या चप्पला वापरणारे शामरावांचे भाऊ
लक्ष्मण यांनीही २००७/०८ साली पालीच्या जंगलात जवळून चालताना पट्टेरी वाघ बघितला
होता. नवजा गावातही काही लोकांनी २००७ ते २०१० सालात वाघ बघितला होता. ज्या
पठारावर ही मंडळी भेटली तिथे बऱ्याच ठिकाणी वाघाच्या विष्ठा दिसून आल्या. सातव्या,
शेवटच्या दिवशी अवसारी सेंटरवर सर्व बीटमधील सदस्यांची मीटिंग झाली. मिटींगमध्ये
शिरसिंग्याच्या खोऱ्यात वाघ ओरडल्याची आणि वाघाने सांबर मारलेल्याची माहिती दाजी
ढमाल यांनी दिली. डिचोली, आंबेघर मधील लोकांनीही वाघाचे ओरडण्याचे आवाज ऐकलेले
होते. वन खात्याने अजूनही जंगलात राहून काम करू इच्छिणाऱ्यांना दोन दिवसांची जादा परवानगी
दिली. निलेशसह इच्छुक १२/१५ जण शिरसिंग्याच्या टॉवरवर पोहोचले. तिथे मुक्काम करून
आठव्या दिवशी सकाळी वाघाने सांबर मारलेल्या पाभळ्याच्या पाण्याजवळ आले. तिथल्या
परिस्थितीवरून वाघाचे सांबर खाणे सुरु असल्याचे लक्षात आले. यातून एक मुद्दा प्रकर्षाने
पुढे येत राहिला तो म्हणजे, पालीत दिसलेला वाघ हा इकडे शिरसिंग्यात येऊन सांबर मारू
शकत नव्हता. अर्थात हे दोन्ही वाघ वेगळे होते. नर की मादी हे कोणालाच कळले नाही. बापूंनी
यापूर्वी जंगलात किमान ५/६ वेळा वाघ बघितला होता. या निमित्ताने निलेश आणि
सहकाऱ्यांनी कोयनेच्या जंगलात पहिल्यांदा ‘ऑनफूट’ वाघ पाहिला.
आरमारी ‘शिव’सत्तेत समुद्रीकोकणचा भौगोलिक प्रभाव !
सर्वात प्रभावी आणि जलद प्रवासाची
सोय असलेल्या नौकानयनात आपले भारतीय प्राचीन काळापासून निष्णात असल्याचे उल्लेख इतिहासात
भेटतात. अर्थात भारतीय राज्यकर्त्यांची नौकानयन परंपरा ही शांतता आणि व्यापाराची
होती. प्राचीन लेण्यांमध्ये सागरीप्रवास आणि व्यापाराचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्रातील
सातवाहन राजे ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन’ या गौरवास्पद
उपाधीने स्वत:ला भूषवित. हजारभर वर्षापूर्वी दक्षिणेतील चोल राजांनी पूर्वआशिया (कंबोडिया-अंकोरवाट) भागात
भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केलेला. तद्नंतर
समुद्रबंदीसारख्या घातक रूढींमुळे भारतीयांनी समुद्राशी नाते तोडले आणि आपले वर्चस्व
गमावले. महाराष्ट्राचा सागराशी असलेला संबंध हा यात्रा आणि अभ्यंगस्नानापुरता राहिला. त्यात
समुद्री पर्यटनाचे अनुभव नसायचे. तेव्हा कोकण किनारपट्टी आरमारीदृष्ट्या विकसित नव्हती. इथे
गुजरातप्रमाणे खुल्या
खोल समुद्रात थेट मार्गस्थ होता येत नसायचे. भौगोलिक
मर्यादांमुळे येणाऱ्या अडचणी, साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे इथले लोकजीवन किनाऱ्यालगत ५/७ किलोमीटरच्या परिघाच्या मर्यादेत वावरायचे. दक्षिण कोकणात तर खाड्या आणि खडकाळ
भागांमुळे किनाऱ्यालगतचा प्रवास सावधपणे करावा लागे, आजही काही
ठिकाणी अशी स्थिती आहे. उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेकडे गोवा
सीमेवरील तेरेखोल खाडीपर्यंतची कोकण किनारपट्टी
भौगोलिक वैशिष्ट्यांनी युक्त होती. इथली लोकसंस्कृती, माणसांचे स्वभाव, त्यांची वृत्ती, संघर्ष
करण्याची मानसिकता हे सारे इथल्या इतिहास आणि भूगोलाचा परिणाम होते. पोर्तुगीज
आक्रमक वास्को-द-गामा ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पोहोचल्यावर इथले किनारवर्ती
वातावरण बदलले. वास्को-द-गामा आल्याची नोंद जगाने घेतली, परंतु आपण नाही. पोर्तुगीजांनी
भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व भारतात अंमलात आणत सागरी सत्तेची
फेरमांडणी केली. पुढे डच, फ्रेंच, ब्रिटिशकाळात हा संघर्ष वाढत गेला. या सागरी
सत्तांनी बळकट जलदुर्ग आणि शक्तिशाली आरमार उभारले. तेव्हा एकाही स्थानिक भारतीय
सत्ताधिशाकडे आरमार नव्हते. भारताचे बादशहा म्हणवून घेणार्या मोगल सत्ताधिशांनाही
समुद्रावर संचार करण्याकरता, पोर्तुगीजांना फी (कार्ताझ) देऊन विशिष्ठ मार्गावर
फिरायचा परवाना घ्यावा लागे. हा कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज गलबतांचे कप्तान
जहाजांना अडवत. मालमत्ता जप्त करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने
व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला.
वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल
असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य
निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या
कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. पराक्रमासाठी आसुसलेल्या इथल्या मावळ्यांची मोट
बांधली. विशेष पूर्वपरंपरा नसताना, कष्टातून, तरबेज आणि अनुभवी विरोधांना धूळ
चारून, सागराचे व्यापारी महत्त्व ओळखून पहिलं
स्वदेशी सागरी आरमार उभारलं. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापाराची खंडीत झालेली परंपरा सुरु केली. याची मांडणी
सचिन पेंडसे यांच्या ‘मेरिटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ या पुस्तकात
भेटते.
१६४८ मध्ये कोकणातील
तळे, घोसाळे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा राजांचा सिद्दीशी संबंध आलेला. राजे
स्वतः खलाशी किंवा दर्यावर्दी नव्हते. त्यांना आरमारी युद्धतंत्राची माहिती
नव्हती. जवळ लढाऊ जहाजेही नव्हती. पाण्यातील किल्ले लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव
नव्हता. मोगल आणि आदिलशाहीला भूमीवर शह देत कोकणात आरमार उभारणे सोपे नव्हते. पोर्तुगीज,
सिद्दी, इंग्रज आणि डचांकडून आरमार उभारण्याचे कौशल्य शिकावयास मिळणे अशक्य होते.
कोकणातला उंचचउंच सह्याद्री दक्खनच्या पठारापासून वेगळा होता. इथे घनदाट जंगल,
अरबी समुद्र, खाड्या, समुद्रातील बेटे आदि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्यांमधील
अंतर कमी राहाणार होते. याचे लष्करी डावपेचांमधील महत्त्व राजांनी अचूक हेरले होते.
कोकणला पश्चिमेकडे समुद्राचे संरक्षण होते. पूर्वेकडूनही आक्रमणाचा धोका कमी होता.
स्थानिक सरदारांच्या माध्यमातून वर्चस्व राखणाऱ्या आदिलशाह आणि मोगल बादशाह यांचे कोकणकडे
विशेष लक्ष नव्हते. त्यांनी आरमारी सामर्थ्य उभे करण्याचा विचार केलेला नव्हता. पोर्तुगीज,
इंग्रज आणि डच आक्रमकांपासून देशाला वाचविण्यासाठी, स्वराज्याला पूर्णत्त्व
आणण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यशाली आरमाराची आवश्यकता महाराजांना जाणवलेली होती. भौगोलिकतेचा
अचूक फायदा घेत राजांनी जमिनीवर गनिमीकावा तंत्र अवलंबिलेलं. तसं इथे, सागरी
सत्तांवर अंकुश मिळवण्यासाठी आरमार आवश्यक होतं. किनारपट्टीवरील अवघड जागी किल्ले
बांधणं गरजेचं होतं. याभागात फिरंग्यांचा संपर्क असल्याने शहरांचा विकास झालेला. वादळात
सापडलेली जहाजे समुद्रकिनाऱ्यावर फुटत असत. त्यात असलेला माल स्थानिक सार्वभौम
सत्तेच्या ताब्यात येत असे. आरमाराच्या दृष्टीने कोकणातील खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ
आसरा होत्या. समुद्रकिनारी असणाऱ्या कठीण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी उत्तम
होत्या. आरमारी संरक्षणाच्या दृष्टीने गिरिदुर्ग आणि जलदुर्गांची बांधणी आणि नवी
संरक्षक स्थळे निर्माण करण्यासाठी किनारपट्टीवरील बेटे आणि समुद्रापर्यंत घुसलेले डोंगरसुळके
मोक्याच्या जागा पुरवायला सज्ज होते. हे आरमारी महत्त्व लक्षात आल्याने राजे कोकणात
शिरायची संधी शोधत होते.
जानेवारी १६५६नंतर
औरंगजेब, बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. विजापूरला अली आदिलशाह मरण
पावला होता. याकाळात राजांनी जावळी जिंकली. दाभोळवर भगवा फडकवला. तेव्हा कोकण
किनारपट्टी निरनिराळ्या राज्यात विभागलेली होती. प्रजा अत्याचारांनी त्रस्त होती.
सह्याद्रीतील डोंगररांगांच्या माथ्यावर उभे राहिलेल्या राजांना सागराच्या भव्यतेचे
दर्शन झालेले. त्यांनी वेश पालटून कोकणपट्टीची पाहाणी करून घेतली. १६५७ला ते उत्तर
कोकणात उतरले. त्यांनी कल्याण, भिवंडी परिसर
जिंकला. आता जिंकलेला समुद्रकिनारा आणि मुलुखाच्या संरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता
होती. आरमारी उभारणीसं आवश्यक नौका भर समुद्रात बांधता येत नाहीत. त्यासाठी
लष्करीदृष्ट्या उपयुक्त अशी समुद्रातून आत घुसलेली खाडी आणि तळ कोकणच्या या
भौगोलिक किनारपट्टीत मुबलक होतेच. १६५७ला कल्याणजवळील दुर्गाडी येथे उत्तम प्रतीचे सागवान
वापरून पहिली २० जहाजे आणि लढाऊ गलबते बनविण्यास राजांनी सुरुवात केली. पुढच्या
काळात राजांच्या आरमारात गाब्र (गुराब-तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज), तरांडी
(माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करणारी नाव), तारव आणि गलबत (जलद चालणारे जहाज),
शिबाड (मालवाहतूक करणारी व्यापारी जहाज), तिर्कटीतारू, मचवा, पडाव, होडी, डोण, पगार आदि
प्रकार राहिले. राजांनी कल्याणची ही जबाबदारी सेनापती आबाजी सोनदेव
यांच्यावर सोपविली. कामात आपल्या स्थानिक लोकांचा समावेश असणं लाभदायक ठरलं. जहाजांसाठी लागणारं लाकूड,
कारागीर उपलब्ध होते, पण तंत्रज्ञान नव्हतं. हे काम दर्जेदार
होण्यासाठी त्यांनी वसईत तारवे बांधणारे कुशल पोर्तुगीज खलाशी लैतांव व्हियेगस आणि
त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगस यांची मदत घेतली. त्यांच्यासोबत ३४० माणसं कार्यरत
होती. आपल्या स्थानिक कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं हा यातला मुख्य
हेतू होता. तसं राजांनी आबाजींना, ‘जी माणसे या कामावर नियुक्त कराल ती अत्यंत कुशाग्र
बुद्धिमत्तेची हवीत, जी ते ज्ञान आत्मसात करू शकतील’ असं सांगितलं होतं. पोर्तुगालचे
मुख्यालय असलेल्या गोव्यात मराठा आरमार उभारणीची ही वार्ता पोहोचल्यावर गडबड होण्याचा
धोका होता. अल्पावधीत तसं घडलं. २ महिन्यांनी व्हेगास नोकरी सोडून गेला. अर्थात तोवर
मावळे बरेचसे शिकले होते. राजांनी आपल्या जहाजांचे डिझाईन युरोपियन प्रमाणे न करता
कोकणच्या भौगोलिकतेला अनुसरून केले. तेव्हा युरोपियन जहाजे खोल पाण्यात लांब
पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बांधण्यात येत. त्यामुळे त्यांच्या पाण्याखालच्या
तळाची खोली अधिक असायची. राजांची जहाजं ही किनारपट्टीच्या आसपास अधिक वावरणार
होती. त्यांनी आपली सुरुवातीची जहाज छोटी आणि सरळ तळ असलेली, वेगाने किनारपट्टी
जवळ पोहोचतील अशी बनविलेली. यामुळे राजांचे आरमार शत्रूंना आव्हान देऊ लागले. नौकाबांधणी,
समुद्र, वारा, खगोलशास्त्र, नाविक रणनीती आदि ज्ञान शिकायला एकेक जन्म पुरायचा
नाही हे वास्तव असताना राजांनी हे सारे जुळविले. रामचंद्रपंत अमात्य यांनी
लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ ग्रंथातील, ‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ या वाक्यात
मराठी आरमाराच्या प्रेरणेचे गुपित सामावले आहे. राजांना आरमारी, जहाज बांधणीज्ञान
संपादन करण्यासोबत नौकाबांधणी, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडणारे जलदुर्ग
बांधणे, माणसे प्रशिक्षित करणे आदि गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्यांनी पुढे आरमाराच्या
वेगवेगळ्या तुकड्या बनविल्या. प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारची २०० जहाजं असायची.
इथल्या भौगोलिकतेचा वापर करीत थेट खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या
संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी द्यायचे तंत्र वापरले. मोठी
जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत असता शत्रु समोर आल्यास एकत्र येऊन
झुंजायचे आणि वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास व गलबत योग्य चालवता येत नसल्यास
शत्रूशी झुंज न देता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे, असे युद्धतंत्र होते.
राजे स्वतः शिस्तप्रिय
असल्याने, आधुनिक प्रशासनाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवस्थेत दिसतात.
नीती-नियमांचे काटेकोर पालन केले जाई. वर्षाचे ८ महिने राजांचे आरमार खुल्या
समुद्रात असायचे. पावसाळ्याचे ४ महिने ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित ठेवले
जायचे. हे काम समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधि व्हायचे. जहाजे खुल्या
उथळ समुद्रात किंवा जलदुर्गाच्या खाली उघड्यावर नांगरून ठेवता येत नसत. छावणी दरवर्षी
वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात होई. एकाच बंदराच्या आसपासच्या गावांना अधिक कष्ट
पडून नये, हे त्यामागचे कारण होते. नाविकांना पावसाळ्याचे ४ महिने शेतीत काम करावे
लागे. आरमारात पठाणासोबत कोकणातील कोळी, सोनकोळी, आगरी, भंडारी, दादली, कोकणी
मुस्लिम आणि कर्नाटकातील अंबी समाजाचे नाविक असत. या लोकांना समुद्र संचाराचे
ज्ञान होते. गावाने प्रत्येकी १०० माणसांमागे २ माणसे आरमाराला द्यावीत अशी मागणी
असे. राजांच्या आरमारात ५ हजार लोक होते. सागरी युद्धाच्यावेळी जलदुर्गांमधून आरमाराला
युद्ध साहित्य पुरवण्यात येई. युद्धकैदी ठेवण्यासाठी जलदुर्गांचा उपयोग होई.
जलदुर्गांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली जहाजे शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित
राहात. नजीकचा परिसर, किनारपट्टी, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे होई.
किल्ल्यांवरील सैन्य आणि तोफांमुळे समुद्रात आणि नदीत येऊ पाहणाऱ्या जहाजांना
परतून लावता येत असे. राजांचे किल्ले उघड्या मैदानात किंवा सपाटीवर अभावाने आढळतात.
भौगोलिकतेचा अचूक उपयोग करून नैसर्गिक बळकटी, अभेद्यता, जलसंचय आणि संरक्षण यांचा
विचार येथे दिसतो. सिद्धीचे सामर्थ्य त्याच्या जहाजात होते. त्याचे आरमार दीडशे
वर्ष जुने होते. तरीही राजांनी शून्यातून आपले आरमार उभारून त्याला सर्व शक्तीनिशी
झुंज दिली. महाराज समुद्राकडे वळले नसते तर कदाचित सिद्दीशी संघर्ष करण्याचा
प्रश्न आला नसता. परंतु स्वराज्याचे ध्येय त्यांनी तडीस नेले. आरमाराच्या जहाजांसाठी
लागणारं लाकूड रयतेला त्रास न देता उपलब्ध झालं पाहिजे याबाबत राजे दक्ष होते. जहाज
बांधणीस कमी पडलेली आंबा, फणसाची लाकडं त्यांनी कर्नाटकातूनही मिळवलेली. महत्त्वाच्या
जहाजांसाठी बंदुकीच्या आणि तोफेच्या गोळ्यांपासून बचाव करणारे महत्त्वाचे लाकूड म्हणून
ते सागवानाचा उपयोग करीत. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या वनसंवर्धनालाही
खूप महत्त्व दिले. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे
लावली. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे राजांची १० हजारावर फौज होती. १६७४ च्या मे
महिन्यात, लष्कराच्या छावणीला त्यांनी दिलेले पत्र, ‘आदर्श राज्य कसं असावं ?’ याचं उत्तम
उदाहरण आहे. ‘राई म्हणजे वनराई’ तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित राजांनी चलनी नाण्यांना ‘शिवराई’ संबोधलं असावं. पुण्याजवळच्या
‘शिवापूर’ गावात राजांनी
दाट शिवराई सजवली होती. राजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला
सागवानाची लागवड केली. पुढे इंग्रजांनी ते तोडले. आजही बाणकोटला काही साग दिसतात.
राजांनी सिद्दीची
इतर ठाणी जिंकली तरी, चौल (उत्तर) आणि दाभोळ (दक्षिण) या दोन प्राचीन बंदरांच्या मधोमध वसलेला जंजिरा जिंकणे
आरमारासाठी आवश्यक होते. त्यासाठी प्रबळ आरमार आणि आर्थिक सामर्थ्य आवश्यक होते.
म्हणून १६६४ मध्ये सुरत लुटण्यात आली. १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन
केलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’शी राजांच्या आरमाराशी इस्ट इंडिया कंपनीच्या मरीनला
लढावे लागले. सुरतेतून मिळालेल्या धनाचा उपयोग करून राजांनी २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग उभारण्याचे
काम सुरु केले. राजांच्या हस्ते
पायाभरणी झालेला तिथला दगडही आज भौगोलिकदृष्ट्या ‘मोरयाचा दगड’ नावाने प्रसिद्ध
आहे. ८ फेब्रुवारी १६६५
ला आपल्या आरमाराचा उपयोग करत राजांनी आदिलशाही राज्यातील धनाढ्य बंदर बसरूरवर
स्वारी केली. हे जोखमीचे काम अभ्यासल्यावर राजांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि
भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहाते. २९ मार्च १९६७ ला सिंधुदुर्गचे
काम पूर्ण झाले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये म्हणून राजांनी येथे
२ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. जंजिरेवर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे
मेहरुबा हा राजांच्या महत्त्वकांक्षेला आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची
असेल, तर दुसरी राजपुरी
वसवावी लागेल हा विचार करून त्यांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर सागरीदुर्ग बांधायचा निर्णय
घेतला. या कुरटे बेटाजवळील पाण्यात आडवे तिडवे छुपे
खडक होते. बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील होते. राजांनी तेथे गड बांधायचे निश्चित
केले. गडावर चोहोबाजूंनी खारेपाणी असताना दहीबाव, साखरबाव आणि दूधबावची उपलब्धी, सुमारे ४० शौचकूपांचे बांधकाम
तिथल्या भौगोलिकतेचा उपयोग स्पष्ट करते. यानंतर राजांनी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, सुवर्णदुर्ग बांधला.
विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून संपूर्ण कोकण किनारपट्टी नियंत्रणाखाली आणली. हर्णै बंदरातील बेटावर १६६३
मध्ये बांधलेला सुवर्णदुर्ग हा राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. याचा उपयोग कैदी
ठेवण्यासाठी केला जाई. विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजा भोज याने ११९५ ते १२०५
मध्ये बांधलेला किल्ला. आरमारी महत्त्व ओळखून राजांनी तो जिंकून घेतला. या भागातले
भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे विजयदुर्गजवळची खडकात खोदलेली ३५५ फुट X २२७
फुट आकाराची गिर्ये गोदी होय. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार ५०० टनी जहाज येथे सहज
बांधता येत असावे. अर्थात राजांकडील सर्वाधिक जहाज २५० टनी होते आणि १५० टनी जहाजे
अधिक बांधली जात. विजयदुर्गपासून १५० मैल अंतरावर पश्चिमोत्तर
समुद्रतळातील ४०० मीटर लांबीची तटबंदीही भौगोलिकतेचे
दर्शन घडवते. ज्या भागात ही तटबंदी आहे त्या बाजूने येणारी अनेक जहाजे
शिवकाळात, धडकून फुटून गेल्याची नोंद आहे. हे कशाने घडते ?
याचे कोडे पोर्तुगीज आणि इंग्रजांना पडायचे. विजयदुर्ग
जिंकून घेतल्यावर तेथे राजांनी पश्चिमोत्तर समुद्राच्या तळात ही संरक्षक तटबंदी उभारल्याचे
किंवा ती शिलाहारांच्या काळात बांधली गेली असावी असे म्हटले जात असले तरी
संशोधकांच्या म्हणण्यानुसार ती भिंत नैसर्गिक आहे. पुण्याच्या डेक्कन पुरातत्त्व
संस्थेचे निवृत्त संशोधक डॉ. अशोक मराठे हे कोकण किनारपट्टीवर पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या
त्सुनामीचा अभ्यास करत असताना त्यांना केळशी-हरेहरेश्वर ते विजयदुर्ग दरम्यान
किनारपट्टीलगत एक रेष आढळून आली होती. ही दगडी भिंत असल्याच्या प्राथमिक
अंदाजानंतर डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्यात पाणबुडे उतरवले.
तेव्हा ही भिंत ८ हजार वर्षे पुरातन असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले होते. इंडियन
हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजचे संशोधक सहायक सचिन जोशी यांनीही ‘मिथ्स अँड रिअॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅपट फोर्ट
विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर करताना, ‘विजयदुर्ग
किल्ल्याजवळची समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे’ असे
म्हटले होते. नंतरच्या काळात आंग्रेंनीही याच भागात समुद्रातील टेकडी ‘आंग्रे बँक’ शोधली.
अर्थात या साऱ्या भौगोलिकतेचा उपयोग सुरुवातीच्या काळात राजांनाही झाला.
इंग्रजांनी २६
नोव्हेंबर १६६४ ला इस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या एका पत्रात, ‘शिवाजी विजयी व
अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी
दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठविली आहेत.’ असे
लिहिले होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार, १६६५ मध्ये मराठा आरमारात ८५ लढाऊ
आणि ३ उच्च दर्जाची जहाज होती. पोर्तुगीज विजरई कोंदि द सांव्हिसेति याने राजांच्या
आरमाराविषयी १६६७च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास, ‘शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक
वाटते. त्याच्याविरुद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावर किल्ले
बांधले. आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत’ असे कळविले होते. संपूर्ण
राजवटीत तारवांमधून (संगमिरी) स्वारी करणारे राजे कदाचित एकमेव असावेत. राजांनी १६७०
मध्ये नव्याने १६० जहाजांची बांधणी नांदगाव (कुलाबा) येथे केली. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावरील संगमेश्वरजवळच्या ओझरखोल (निढळेवाडी) येथेही राजांनी नौकाबांधणी सुरु
केली होती. छत्रपतींच्या आरमारातील प्रसिध्द 'संगमेश्वरी' नौका इथली. शिवकालीन
नौकाबांधणीची ही तंत्रपरंपरा आजही सुरु आहे. चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीवरील
गोविंदगड हा दाभोळ खाडीतील
आरमाराला निरोप पोचविणे, तेथून येणारे
निरोप स्वराज्याची राजधानी रायगडावर पोचविणे या कामातील दुवा म्हणून काम करायचा. रायगडावर विशिष्ठ ठिकाणी आग पेटविल्यावर
गोविंदगडाच्या समोरील सह्याद्रीतून ती दिसायची.
रायगडावर पेटविलेली आग पाहून गोविंदगडावर खुणेची आग पेटविली जाई. याद्वारे फार थोड्या वेळात
राजधानी रायगड ते मराठा आरमार यांच्यात
संदेशाची देवाणघेवाण होई, इथे आपल्याला भौगोलिक महत्त्व दिसून येते. राजांनी या जलदुर्गांच्या
ताकदीवर समुद्रावर जरब बसवित सागरी व्यापार सुरु केला. समुद्राला पश्चिमेकडील
नद्या जिथे मिळत तिथे बंदरे होती. त्यातूनही वाहतूक चाले. खास मीठाच्या (सॉल्टफ्लीट) वाहतुकीसाठी राजांनी
गलबतांचा तांडा तयार करून घेतला होता. १६६५ च्या सुरतकर इंग्रजांच्या पत्रानुसार,
दरवर्षी दक्षिण कोकणातील ७/८ बंदरातून राजांची २/३ गलबते पर्शिया, बसरा, आणि
मोक्का (अबेसॅनिया) बंदरात व्यापारासाठी जात. परकीय सत्तांशी व्यापार करताना
राजांनी आयात कमी आणि निर्यात जास्त हे वाणिज्य अनुकूल धोरण अवलंबिले होते. कोकण आणि घाट जोडणारे
घाटमार्ग हे व्यापाराचे राजमार्ग होते. त्या मार्गांवर उभारलेले किल्ले चेकपोस्टचे
काम करायचे. १६६९ पर्यंत गोवा, वसई, मुंबई ही मोठी समुद्री शहरं वगळता सगळं
ताब्यात घेतलं. आरमाराला एक सुसंघटीत आणि फायदेशीर संस्थान बनवलं. या आरमाराने पुढे
जवळपास १५० वर्ष राज्य केलं.
राजांनी मुरुड-जंजिऱ्याजवळ
पद्मदुर्ग (कांसा) बांधला. या पद्मदुर्गच्या भिंतींचे दगड झिजलेत पण दरजा भरलेला
चुन्याचा मसाला झिजला नाही. मुंबईजवळ खांदेरी बंदरावरच्या बेटावर १६७२ मध्ये
किल्याचं बांधकाम सुरु केलं. तत्पूर्वी या बेटांवर युरोपियन लोकांना गोड्या
पाण्याची सोय करणे जमले नव्हते. राजांनी आपल्या संस्कृतीतील ज्ञानाच्या आधारे येथे
गोड्या पाण्याचे झरे शोधले. कामास विरोध करण्यासाठी इंग्रजांनी किनारा आणि बेट
यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे ठरवले. त्यांना आपल्या मोठ्या जहाजांचे
विशेष महत्त्व वाटत होते. त्यामुळे कोकणातला उथळ समुद्र आणि खाड्यांचा विचार
करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांच्या मोठ्या जहाजांना खाडीमध्ये ठिय्या देणे
जमले नाही. वार्यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात. त्या दगडांवर
आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. उथळ
पाण्यात मराठ्यांच्या छोट्या बोटींविरोधात इंग्रजांच्या बोटी जिंकू शकल्या नाहीत.
राजांनी आपले आरमार आपल्या हद्दीत वावरणारे केलेले. मराठे लोकं रातोरात या
चिंचोळ्या होड्या वल्हवत विविध बेटांवर सामान पोहवत. इंग्रज जहाजे पूर्णपणे वार्यावर
अवलंबून असत. खांदेरीच्या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलयी
वारे आदिंचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. खांदेरी
उभारताना आजूबाजूला मोठाले दगड टाकण्यात आले. त्याच्यावर कालवे वाढून दगडाच्या कडा
धारधार होतील. पायाला इजा होऊन त्यास सागराचे खारेपाणी लागताच आग होईल आणि पोहोचणं
अवघड बनेल अशी योजना होती. जवळचा काशाखडक ते खांदेरी हा सागरीप्रवास खडकाळ आहे. तिथे
पाण्याला उलट-सुलट प्रवाह असून अचानक बदलणारे वातावरण अशी त्या सागरीपट्ट्याची आजही
भौगोलिक ओळख आहे. १६७८ ला कुलाबा किल्याचं काम सुरु झालं. मोठाले दगडी चिरे
एकमेकांवर रचून भिंती बांधण्यात आल्या. चुन्याने दरजा भरल्या नाहीत. समुद्राच्या
लाटा भिंतीवर आदळल्या की त्यांचं पाणी दोन दगडांच्या फटीतून आत जावं आणि पाण्याच्या
प्रवाहाचा रोध कमी व्हावा, हा विचार भौगोलिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निसर्ग
सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीतल्या समुद्री
कोकणला राजांनी आरमारी उभारणीने बळकट बनवले. त्यांनी जमिनीवरील
युद्धात जसा सह्याद्रीतले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले आदि
भौगोलिकतेचा पुरेपूर वापर करून घेतला तसाच आरमारी युद्धात किनारपट्टीच्या भौगोलिक
रचनेचा उपयोग केला. स्वराज्य निर्मितीसाठी निष्ठावान मावळ्यांप्रमाणे
सह्याद्री, सागराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. राजांच्या
आरमाराविषयी जेम्स डग्लस म्हणतो, ‘शिवाजी जन्माने खलाशी नव्हता, ही त्या ईश्वराची
कृपा होय. जर असता तर जशी त्याने भूमी पादाक्रांत केली त्याप्रमाणे सागरावर आपला
अंमल गाजवला असता. खलाशी नसताना त्याने सागरावर आपले वर्चस्व स्थापन केलेच.’
सह्याद्री आणि सागराच्या या इतिहासात मानवी सामर्थ्याला अपयशी करण्यास निसर्ग आणि
भौगोलिकता कारणीभूत ठरल्याचे दिसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी
स्वराज्य आणि आरमार उभारण्यापासून कोणालाही रोखता आलं नाही.
राजांच्या जीवनातील व्यवधानता पाहाता, सागरी सत्तेसारख्या अनोख्या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या असामान्य कर्तृत्त्वात भौगोलिकतेचा मोठा प्रभाव आहे. राजांच्या आरमाराविषयी कमी लिहिलं गेलं आहे. आजही जगातील ९० टक्के व्यापारी माल आणि वस्तूंची वाहतूक सागरी मार्गाने जहाजाद्वारे होत आहे. आगामी काळात समुद्रमार्ग हा प्रवासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह मोठ्या प्रमाणात खुला व्हायला हवा आहे. तसा तो व्हावा म्हणून अख्खं जग प्रयत्न करते आहे. आपले केंद्र सरकारही यावर काम करते आहे. महत्त्वाचा मार्ग म्हणून सागरीमार्गाला महत्त्व यायला विमान आणि रस्त्यांचे अपघात, प्रवासास लागणारा वेळ, आणि पैसा हेही कारण आहे. केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नातून ‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ अंतर्गत समूह सागरी सेवा प्रकल्प गोव्यात सुरु होण्याबाबतची वृत्त आपण वाचली आहेत. प्रत्येकाला समुद्राच्या तळाशी जाणे शक्य नसल्याने भविष्यात जगातल्या समुद्रीतळाची डिजिटल लायब्ररी तयार होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच भारताने सागरी सत्ता बनण्यासाठी विचार करायला हवा आहे. वर्षभरापूर्वी मुंबई विद्यापीठात सागरी मार्ग वाहतूक यावर एक सेमिनारही झाला होता. आपला अधिकतर इतिहास हा बखरी आणि प्रवासवर्णनातून लिहिला गेलेला आहे. त्याजोडीला इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा चिकित्सक अभ्यास वास्तूविशारदशास्त्राच्या दृष्टीने व्हायला हवाय. त्यातून इतिहासाची अधिकची भौगोलिक चिकित्सा पूर्ण होऊ शकेल.
संदर्भ :
१. मराठी विश्वकोश (http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9817&Itemid=2)
२. केतकर ज्ञानकोश
५. https://www.thinkmaharashtra.com/node/2045
६. शिवछत्रपतींचे आरमार -
गजानन भास्कर मेहेंदळे
७. महाराष्ट्रेतिहास परिषद
निबंध संग्रह-३, १९६८
८. कोकणचा राजकीय इतिहास –
डॉ. खोबरेकर (१९९७)
९. इतिहास आणि भारतीय
संस्कृती – जानेवारी - मार्च २०१२
१०. इतिहास आणि भारतीय संस्कृती – एप्रिल – जून २०१६
११. छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) – वा. सी. बेंद्रे
१२. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आणि नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे आणि मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद ‘ए फिफ्थ पर्स्पेक्टीव्ह’चे चंद्रशेखर बुरांडे यांच्याशी चर्चा.
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,
कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे ‘कलादालन’
![]() |
| दैनिक तरुण भारत नागपूर दिनांक २६.११.२०१९ INCLUDES NAGPUR AKOLA WASHIM YAVATMAL VARDHA BHANDARA GONDIYA CHANDRAPUR GADACHIROLI BULDHANA AND KHAMGAON |
![]() |
| दैनिक प्रहार दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ |
![]() |
| दैनिक तरुण भारत (संवाद पुरवणी) दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ |
![]() |
दैनिक रामप्रहर रायगड (दिनांक २९ नोव्हेंबर २०१९)
वरील लेखाची लिंक : https://ramprahar.com/33256/
|
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले संवर्धन
तिवरे ते मालदेव’ व्हाया ‘बैलमारव घाट’
| प्राचीन बैलमारव घाट |
![]() |
| मालदेवच्या दिशेने कूच करताना ट्रेकर्स |
| मालदेवहून दिसणारे तिवरे धरण |
![]() |
| ट्रेकमधील एका निवांत क्षणी ब्लॉगलेखक |
![]() |
| २५०० फूट उंचीवर पोटपूजा ! |
चला ! ‘चिपळूण’ला मुक्कामी जाऊ या !
डेस्टिनेशन चिपळूण’च्या दिशेने...!
![]() |
कोकणाचा स्वामी भगवान परशुराम मंदिर
|
![]() |
धामणवणे
येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्समधील जंगल सफारी
|
![]() |
| एस.आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सची माहिती घेताना टूर ऑपेरेटर्स |
![]() |
प्रसिद्ध विसावा पॉइंट
|
![]() |
श्रीदेवी
करंजेश्वरी
|
किल्ले
गोविंदगड भेट
|
![]() |
वाशिष्ठी खाडीतील बेटास भेट
|
![]() |
खाडीतील जल पर्यटन
|
खाडीतील क्रोकोडाईल पर्यटन
|
सवतसडा धबधबा
|

































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.