हळूहळू भूकेची जाणीव होऊ लागली. पण रस्त्यात चांगली हॉटेल्स दिसेनात. एखादे दिसलेच तर गाडी तोवर पुढे गेलेली असे. पुन्हा मागे वाळवायला कंटाळा येई. असे करत करत बरेच पुढे आलो.आंबा घाट ४-५ कि.मी. राहिला असताना मात्र पोटात कावळे कोकलायला लागले आणि आधी एकदा जिथे थांबलो होतो, त्या 'डोसा पॉइंट' नावाच्या हॉटेलात थांबलो.
निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल आहे. त्यात अध्येमध्ये पाऊस पडत असल्याने हिरवेगार वातावरण होते.
पण गिर्हाइक कोणीच दिसले नाही. नाइलाज म्हणून डोश्याची ऑर्डर दिली आणि फ्रेश होऊन टेबलावर येऊन बसलो.
थोड्या वेळात डोसा आला. पण वाटले होते त्याप्रमाणे चव यथातथाच होती. जेमतेम जेवण उरकले आणि निघालो. पण हातात निदान पोट भरलेले असल्याने बरे वाटत होते. काही मिनिटांतच आंबा घाट सुरू झाला.आधी एक-दोन वेळा इथे राहून गेलो असल्याने तो परिसर ओळखीचा होता. मात्र अंधारून आले होते आणि पाऊस मध्ये मध्ये बरसत होता. त्यामुळे फारसे न थांबता तसेच पुढे निघालो. अंधार लवकर पडायची चिन्हे दिसत होती आणि शक्यतो अंधार पडायच्या आत मुक्कामी पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता.
लवकरच आंबा घाटाची वळणे सुरू झाली आणि धुक्याने स्वागत केले. अपर लाइट लावूनसुद्धा फारसा फायदा होत नव्हता. सगळ्या गाड्या ब्लिंकरसुद्धा चालू ठेवून जात-येत होत्या. निसर्गापुढे माणूस शेवटी दुबळाच, याची सतत जाणीव होत होती. त्याच वेळी घाटातले सुंदर देखावे मात्र नजरेला वेड लावत होते. हळूहळू घाटाची उतरण सुरू झाली आणि धुके संपले. पाऊसही निवळला आणि जरा सूर्यप्रकाश दिसू लागला. बराच वेळ गेला असेल, चहाला थांबायची गरज वाटत होती, पण पुन्हा एकही हॉटेल दिसेना. नाणीज वगैरे पाठी पडले , बर्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे चालू होती आणि त्यासाठी कडेची मोठमोठी झाडे एकतर तोडली होती किंवा तोडायचे काम चालू होते. वर्षानुवर्षे वाढलेली झाडे यांत्रिक करवतीने काही मिनिटांत जमीनदोस्त होत होती. ते बघून मनात कालवाकालव होत होती, पण सरकारी कामाला कोण अडवणार? मग बाजारवाडी का कायतरी आले आणि चहाला एक थांबा घेतला.
पाऊस पूर्ण थांबला होता आणि चांगला सूर्यप्रकाश होता, त्यामुळे बरे वाटत होते. अंधार पडायच्या आत मुक्काम गाठता येईल अशी खातरी वाटत होती. पण पुढे एक घोळ झाला - बायकोशी गपा मारता मारता निवळी फाट्याला डावीकडे आत जायचे सोडून सरळ पुढे गेलो. १० कि.मी. पुढे आल्यावर रस्ता चुकल्याचे लक्षात आले. एक-दोन स्थानिक लोकांना विचारले, तर ते म्हणाले, "इथून असेच पुढे गेलात तरी मालगुंडचा रस्ता मिळेल, पण रस्ता जरा खराब आहे." मग रिस्क घेण्यापेक्षा परत उलट फिरून निवळी फाट्याला आलो आणि बरोबर रस्ता पकडला.
थोडा वेळ गेला आणि अचानक रस्त्यात बराच ट्रॅफिक दिसू लागला. मोठमोठी वाहने एका रांगेत उभी होती. छोटी वाहने मात्र जात होती. काय झाले असावे याचा विचार करतच पूढे जात राहिलो, तर पुढे चाफे येथे दोन ट्रकची हेड ऑन धडक होऊन रस्ता अडला होता. सुदैवाने स्थानिक पोलीस पोहोचले होते आणि वाहतूक सुरळीत करायच्या प्रयत्नात होते. त्यामुळे फार वेळ न जाता तिथून लवकर सुटका झाली.
आता चाफ्यावरून डावीकडे वळून गणपतीपुळ्याची वाट धरली. साधारणपणे संध्याकाळचे ६ वाजले होते आणि अंधार पडायला अजून अवकाश होता. काय करावे? थेट मुक्कामाला जावे की पहिले देवदर्शन करावे अशी चर्चा चालू झाली. पण या वेळी फक्त २ दिवसात सगळे देवदर्शन पूर्ण करायचे असल्याने हाताशी वेळ कमी होता. त्यामुळे हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करावा, यावर एकमत झाले आणि गाडी नेवरे फाट्याला वळवली. खूप वेळाने आतल्या बिनाट्रॅफिकच्या रस्त्याला गाडी चालवायला बरे वाटत होते. थोड्याच वेळात बायकोचे कुलदैवत असलेल्या बंडिजाई देवीला पोहोचलो. छोटेखानी रस्ते, कौलारू घरे, संध्याकाळची उतरती उन्हे, गणपतीपुळ्यापासून जवळच पण पर्यटकांचा ओघ नसलेले सुशेगाद गाव. मंदिराची देखरेख करणाऱ्या केळकर गुरुजींच्या घरी पोहोचलो, रस्त्याकडेला गेट, तिथून साधारण २५-३० फूट खाली उतरणारा दगडी मार्ग आणि खाली ऐसपैस घर, आजूबाजूला फूलझाडे, पडवीत झोपाळा असे मस्त निवांत आयुष्य जगणे कोणाला नाही आवडणार? पण घरात काहीच चाहूल लागेना. कडी वाजवूनही उपयोग झाला नाही. अखेर बाजूच्या गोठ्यात झाडण्याचा आवाज येत होता तिकडे डोकावलो, तर एक गडीमाणूस दिसला. त्याने सांगितले की "बसा जरा, गुरुजी किंवा त्यांची पत्नी येतीलच इतक्यात." त्याप्रमाणे जरा झोपाळ्यावर टेकलो आणि पाणी प्यायलो. तोवर गुरुजी आलेच, देवळात दिवाबत्तीसाठीच गेले होते. देऊळ थोडे लांब आणि पुन्हा चिरेबंदी पायऱ्या उतरून जायला लागते. त्यामुळे आमच्याबरोबर पुन्हा न येता त्यांनी फक्त किल्ली दिली आणि "दर्शन घेऊन ओटी भरून परत द्या" म्हणाले.
किल्ली घेऊन आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत चिऱ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेलो. देवळात चिटपाखरूही नाही. स्वच्छ परिसर, चारही बाजूंनी बांधलेला कट्टा , आसपास अनेक प्रकारची झाडे, वातावरणात पक्ष्यांची किलबिल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पानाफुलांची भरून राहिलेले सुवास असा एक मस्त माहौल तिकडे तयार झाला होता. कुलूप उघडून गाभाऱ्यात गेलो. तिथे पूर्ण अंधार, चाचपडत कसेतरी दिव्याची बटणे शोधून काढली आणि दिवा लावला. आत एक प्रकारचे गूढ वातावरण भरून राहिले होते. नुकत्याच लावलेल्या निरंजनाचा प्रकाश आणि उदबत्तीचा सुवास पसरला होता. त्यात श्रीदेव लक्ष्मीकांताची आणि बंदीजाईची मूर्ती सुंदर दिसत होती.
काही वेळ तिथे नि:शब्द बसून राहिलो. मग भानावर येऊन ओटी वगैरे भरली, दर्शन घेतले आणि पुन्हा कुलूप लावून बाहेर पडलो. मनात अनेक विचारांची दाटी झाली होती. आपल्याला इथे यावेसे का वाटते? इथे आल्यावर जिवाला शांतता का मिळते? आपली कुलदैवते म्हणजे आपले पूर्वजच असतील काय? कधीतरी त्यांच्यापासूनच आपला वंश सुरू झाला असेल काय? आपल्या पूर्वसुरीनी इतक्या अवघड ठिकाणी वस्ती का केली असेल? इथे काही शे वर्षांपुर्वी ते जेव्हा आले असतील, तेव्हा इथला परिसर कसा असेल? दाट जंगल, श्वापदे, भुतेखेते या सर्वांशी झगडून ते इथे कसे वसले असतील? अशा अडचणींमध्ये मनाचा धीर टिकून राहावा, म्हणून त्यांनी इथे ही दैवते स्थापली आणि सांभाळली असतील किंवा कसे? कशी त्यांनी आपले आचारविचार, यमनियम, उपासना सांभाळले असतील? एक न अनेक. विचारांच्या ओघातच चिरे चढून वरती आलो आणि पुन्हा किल्ली गुरुजींना नेऊन दिली.
आता पुढचा टप्पा होता मालगुंड. ढोकमळे फाट्याला बाहेर पडून उजवीकडे आरेवारे किनार्याच्या बाजूबाजूने रस्ता जात होता. थोड्याच वेळात घाट सुरू झाला आणि चढण लागली. उजवीकडे डोंगर आणि डावीकडे नजर जाईल तोवर अथांग पसरलेला चमचमणारा सागर , त्यात दूरवर पसरलेल्या मासेमारी करणाऱ्या होड्या असा सुंदर नजारा होता. शेवटी एक खिंड लागली आणि उतरण सुरू झाली. पाचच मिनिटांत गाडी गणपतीपुळ्यास पोहोचली. नेहमीसारखा आत शिरलो असतो, तर रात्री जेवायला भाऊ जोश्यांकडे नंबर लावला असता. पण आमचा मुक्काम पुढे असल्याने आत न शिरता पुढे निघालो आणि गावाला वळसा घालून खाडी ओलांडून मालगुंडमध्ये पोहोचलो. अजूनही पूर्ण अंधार झाला नव्हता, त्यामुळे मुक्कामी जाण्यापुर्वी आणखी एक देवदर्शन पूर्ण करावे, अशा विचाराने गाडी पुढे घेतली. पुढचे दर्शन होते मुसळादेवीचे. त्याची किल्ली घेण्यासाठी स्वाद डायनिंगवाल्या अमित मेहेंदळ्यांकडे पोहोचलो. डायनिंग हॉल उघडण्यास थोडा अवकाश होता, त्यामुळे तेही जरा निवांत होते. मग काही वेळ गप्पा झाल्या, कॉफी झाली आणि किल्ली घेऊन निघालो. देवीचे देऊळ गावात जरा आतल्या बाजूला आहे. रस्ता लहान आहे, पण बरेच ठिकाणी नवीन बंगल्यांची बांधकामे चालू असलेली दिसली. मालगुंड अजूनही तसे कमर्शियल झाले नाहीये, कदाचित गणपतीपुळ्यापासून जवळ आणि तरी जागेची किंमत कमी हे एक कारण असावे. मुसळादेवीचे मूळ स्थान अज्ञात आहे. त्यामुळे सगळ्या मेहेंदळ्यांनी एकत्र येऊन इथे देवीची स्थापना केली आहे.
देवीचे दर्शन घेऊन आणि ओटी भरून बाहेर पडलो. मेहेंदळ्यांकडे गप्पा मारत असतानाच "राहायची काही सोय झालीये का?" असा प्रश्न आला होता. नाही म्हणालो. मग मुक्कामासाठी त्यांनीच बापट होम स्टे म्हणून एक नाव सुचवले. स्वतःहोऊन त्यांना फोन करून आम्ही राहायला येत असल्याचे कळवूनही टाकले. त्यामुळे गाडी पुन्हा गणपतीपुळ्याकडे वळवली. खाडी पार करून लगेच हे ठिकाण आहे.
आवारात एका बाजूला त्यांचा बंगला आणि दुसऱ्या बाजूला दोन मजली इमारतीत पर्यटक निवास अशी सुटसुटीत व्यवस्था आहे. खोल्याही नवीन बांधलेल्या आणि स्वच्छ आहेत. भाडे १२०० ते १३००. त्यामुळे राहायची छान सोय झाली. रात्री पुन्हा घरगुती स्वादिष्ट जेवणासाठी स्वाद डायनिंग हॉलला भेट दिली आणि भरल्या पोटाने मुक्कामी परतलो.
रात्री २-३ वेळा वीज गेली आणि जनरेटरच्या आवाजाने जाग आली. पण तेवढे वगळता एकूण झोप छान लागली.
सकाळी लवकर आवरले आणि बाहेर पडलो. अंगणात प्राजक्ताचा सडा पडला होता.
मस्त सुगंधी सकाळ, वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत आलो, तर दूरवर समुद्राची गाज आणि अंगणात पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. सोनेरी उन्हे पसरली होती.
तयार होऊन निघालो आणि पहिले गणपतीपुळ्यात येऊन गरमागरम नाश्ता केला, मग चालतच देवळात गेलो. गर्दी अजिबात नसल्याने छान दर्शन झाले. प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो, तोच रिमझिम पाऊस सुरू झाला. जरा आडोशाला उभे राहिलो, तोवर झरझर धारा कोसळू लागल्या आणि लोकांची धावपळ उडाली.
मागच्या बाजूला समुद्राला भरती आली होती आणि इकडे पावसाचे तांडव चालू होते. सुदैवाने १० मिनिटांत आभाळ फाकले आणि पुन्हा सूर्यदर्शन झाले. मग मात्र वेळ न घालवता बाहेर पडलो आणि गाडी काढून पुढच्या दिशेने कूच केले. पुन्हा चाफ्याला येऊन गाडी डावीकडे घातली आणि कोळिसरेचा रस्ता पकडला. वाटेत ठिकठिकाणी दिसणाऱ्या पाट्या आणि जोडीला गूगल असल्याने रस्ता कुठेही ना चुकता कोळिसरे फाट्यावरून उजवीकडे वळलो आणि छोटासा घाट उतरून मंदिरापाशी दाखल झालो. ईथे हा बोर्ड दिसला
गाडी लावून पुन्हा काही चिऱ्याच्या पायऱ्या उतरलो, तोवर मंदिराचे कळस दिसू लागले.
अतिशय शांत अनगड ठिकाणी हे देऊळ आहे. वाटेत हा ओहोळ ओलांडायला पूल आहे
पुर्वी मागच्या बाजूचा हा रस्ता नव्हता. वरती मराठे नावाचे पुजारी राहतात, त्यांच्या घराजवळून जवळपास ३०० पायऱ्या उतरून खाली दरीत यावे लागे. राहायची सोयही त्यांच्याकडेच होत असे. मी १९९५-२००० दरम्यान इथे काही वेळा येऊन गेलो असल्याने पूर्वी आणि आत्ताचा फरक नक्कीच जाणवतो.
इथे पोहोचलो, तेव्हा पूजेची तयारी चालू होती. अनायासे गुरुजींनी विचारले की अभिषेला बसणार का? त्यामुळे सोवळे नेसले आणि बसलो. लक्ष्मीकेशवाची पुरुषभर उंच मूर्ती गंडकी शिळेतून घडवली आहे, पण अभिषेकाची मूर्ती धातूची आहे. मुख्य मूर्तीला कमान आहे आणि त्यावर प्रभावळ फार सुंदर कोरली आहे.
विष्णूच्या हातातील शंख्, पद्म्, गदा आणि चक्र यांच्या क्रमानुसार जी नावे घेतली जातात, ती अशी -
त्याबद्दल सर्व माहिती देवळातील फलकावर आहे. यथावकाश विष्णुसहस्रनामासहित अभिषेक पार पडला.
आरती आणि तीर्थप्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. मंदिराच्या आसपास अतिशय रम्य परिसर आहे. एका बाजूस दरीत उतरायला पायऱ्या आहेत. तिथे खाली एक स्वच्छ पाण्याचा झरा वाहत येतो. तो देवाच्या पायाखालून येतो, म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे. पावसचे श्री स्वरूपानंद स्वामी यांच्यासाठी पिण्याचे पाणी नेहमी इथून नेले जात असे.
आवारातील एक पुरातन वृक्ष
तिथे थोडा वेळ घोटाळलो. पोटभर पाणी पिऊन घेतले आणि बाटल्या भरून घेतल्या. आवारात रत्नेश्वर महादेव, मारुती अशी देवळे आहेत. तिथे दर्शन घेतले. वाटेत एका ठिकाणी या माऊने अशी पोझ दिली
गुरुजींना जेवणाचे विचारले. पण जेवणाला अजून वेळ होता आणि आम्हाला वेळेत पुण्याला परतायचे होते. ६-७ तासांचा रस्ता होता. त्यामुळे फार वेळ थांबणे शक्य नव्हते. अखेर भरल्या मनाने आणि जड पायांनी तिथून निघालो. येताना वाटेत चाफ्याला थांबून काजूगर आणि कोकम आगळ घेतले, थंडगार ताक प्यायलो आणि परतीचा प्रवास सुरू केला ते पुढच्या वर्षी यायचा संकल्प सोडूनच.
मालवण, निवती, वेंगुर्ले - एक आनंदयात्रा
पावसाळ्यामधील कोकणाचं सौंदर्य आजवर अनेकांच्या लेखातून, कवितेतून फोटोंमधून व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे त्यात जरी नावीन्य नसलं, तरी मला मात्र ते अगदी पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. गेल्या फेब्रुवारीतच खरं तर जाणार होतो. पण काही कारणास्तव नाही जाता आलं. त्यामुळे यावेळी उत्साह अजूनच वाढला होता. नुकताच गणेशोत्सव होऊन गेला असल्यामुळे गर्दी फारशी नसेल हा अंदाज जरी खरा ठरला तरी पावसाचा अंदाज मात्र साफ चुकला. पनवेल वरून रात्रीची गाडी पकडून आम्ही सकाळी सहा वाजता कुडाळ स्टेशनवर पोहोचलो. गाडी बाहेर पडल्यावर पावसाने मनसोक्त भिजवत स्वागत केले. कुडाळ स्टेशन वरून रिक्षा पकडून आम्ही मालवण येथील ओझर तिठा येथे पोहोचलो. बॅगा टाकून, आंघोळ नाश्ता वगैरे उरकून आम्ही पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. पहिला पडाव होता तो मालवणच्या उत्तरेला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आणि गड नदीच्या मार्गात वसलेले पाणखोल जुवा हे गाव. तिथे अर्थातच बोटीतून जावे लागते. बोटीतून जाताना पाऊस पडत असल्यामुळे थोडी भीती जाणवत होती. समोरच्या तीरावर सुखरूपपणे उतरल्यानंतर आणि बेटावर पाऊल टाकल्यावर त्या जागेचा वेगळेपणा जाणवला. चोहो बाजूंनी वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आसपासची गर्द हिरवी झाडी, त्या झाडांवर पावसापासून आसरा घेणाऱ्या असंख्य पक्षांची चाललेली गुंजारव ऐकत, गर्द झाडांमधूनच गावाकडे गेलेली अरुंद निसरड्या पायवाटेवरुन, चालताना खूप प्रसन्न वाटत होते. आकाशात ढगांची एवढी दाटी झाली होती दिवसाढवळ्या एक हिरवट अंधार पसरला होता. बेटावर फिरताना तिथल्या गावकऱ्यांनी अनेकदा निसरड्या वाटेवरून सांभाळून चालण्याचा सल्ला दिला. तासभर बेटावर मनसोक्त फिरल्यावर आम्ही परतलो. तिथून पुढे तळाशील बीचवर जाताना वाटेत मसुरे गावात थांबलो आणि गड नदीच्या काठावर बसून पडणाऱ्या पावसाला बघत थोडा वेळ विसावा घेतला. तळाशील बीचवर जेव्हा पोहोचलो तेव्हा पाऊसही जोरात पडायला लागला होता. तसेच पावसात भिजत बीचवर छान फेरफटका मारण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी निवतीला जायचं होतं. सकाळी ओझर तिठ्याजवळ असलेल्या एका गुहेत स्थित असणाऱ्या ब्रह्मानंद स्वामी महाराजांची समाधी बघायला गेलो. पाऊस अजूनही पडतच होता. त्या समाधीला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठाले वृक्ष आहेत. वातावरणात चांगलीच थंडी पसरली होती. असे असले तरीही तिथे एक पाण्याचे कुंड होते ज्यामधले पाणी चक्क गरम लागत होते. काय आश्चर्य! निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे समाधी स्थान अतिशय सुंदर आणि मन उल्हसित करणारे आहे.
निवतीला जाण्याअगोदर सर्जेकोट बंदरावर जायचं ठरवलं. बंदरावर पोहोचलो तेव्हा वाऱ्याने एवढा जोर धरला होता की बंदरालगत उभ्या असलेल्या होड्या अक्षरशः गदागदा हलत होत्या. आपापल्या नौकांना स्थिर करण्यासाठी नावाड्यांची चाललेली धडपड बघून त्यांचं खूप कौतुक वाटलं. जवळ असलेल्या पठारावर थोडं चढून गेल्यावर समुद्राचं खवळलेलं रौद्रभीषण रूप बघून मनात धडकी बसल्याशिवाय राहिली नाही.
मालवण वरून निवतीला जाताना आधी धामापूर आणि वालावल येथील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थळांना भेट द्यायचं ठरवलं. जसा पाऊस कधी तीव्र कधी मध्यम स्वरूपात पडत होता, तसा रस्ता सुद्धा कधी तीव्र उताराचा कधी डोंगराळ भागातून तर कधी रानामधून आणि कधी कधी समुद्राच्या अगदी जवळून जाऊन कोकणाच्या निसर्गाची विविध रूपं दाखवत होता. धामापूरचा तळ्याच्या काठी वसलेलं भगवती मंदिर आणि तसेच वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर बघितल्यावर खरंच स्वप्नातल्या गावात आल्यासारखं वाटलं. वालावलच्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या जवळच तळ्याच्या काठाशी एक औदुंबराचे झाड आहे. त्याच्या पारावार बसून मंदिराच्या आसपासच्या परिसराचा आणि तिथल्या प्रसन्न वातावरणाचा घेतलेला अनुभव हा भाग्याचा क्षण म्हणावा लागेल.
वालावलवरून आम्ही निवती बीचवर जाणार होतो. त्याआधी किल्ले निवतीवर चढून गेलो. तिथे किल्ल्यावर पोहोचल्यावर वारा एवढा जोराचा वाहत होता की वाऱ्याबरोबर उडून जातोय की काय अशी भीती सतत जाणवत होती. किल्ल्यावरून निवती बीच, खोल समुद्रात उभ असलेलं निवती दीपगृह, आणि निवती गोल्डन रॉक्स यांचे विहंगम दृश्य दिसतं. दूर समुद्रात सूर्याच्या उन्हाचे कवडसे अधूनमधून खालच्या पाण्यावर पडत होते. ढगांबरोबर आणि वाऱ्याबरोबर ते कवडसे सुद्धा किनाऱ्याकडे सरकत होते. किनाऱ्यालगत समुद्री घार आणि इतर शिकारी पक्षी वाऱ्यासोबत उडण्याची कसरत करून खाली भक्ष्याचा वेध घेत होते. किल्ले निवती वरून खाली पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती.
निवती बीचवरच्या एका बीच रिसॉर्टवर आम्ही राहणार होतो. या बीच रिसॉर्टवर राहायला उत्तम टेंट्स उपलब्ध आहेत. ही जागा थोडीशी दुर्गम असल्याकारणाने तारकर्ली, आचरा किंवा देवबाग बीचवर होते तशी गर्दी नव्हती. बॅग्स वगैरे टाकून आणि फ्रेश होऊन फिकट होत चाललेला संधी प्रकाश बघत बसलो. रात्री गावातच जेवणाचा फक्कड बेत होता. रात्रीच्या पावसात आणि अंधारात मोबाईलचा टॉर्च लावून आणि थोडं ट्रेकिंग करून आम्ही गावात एका घरी जेवणासाठी गेलो. संध्याकाळी गावातल्याच पारंपरिक मच्छिमार बांधवांनी पकडलेल्या माशाचं कालवण, तळलेले मासे, आणि गरम गरम भात जेवताना बोरकरांच्या कवितेतल्या या ओळी आठवल्या शिवाय राहिल्या नाहीत.
दिवसभरी श्रम करीत राहावे
तिखट कढीने जेवून घ्यावे
मासोळीचा सेवित स्वाद दुणा II
दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या कोंडुरा बीचवर भटकंतीसाठी गेलो. आज आकाश मोकळं दिसत होतं. इतके दिवस ढगांच्या आड लपलेल्या सूर्यनारायणाने आज दर्शन दिलं होतं. त्यामुळे वातावरणात एक नवा उत्साह निर्माण झाला होता. गेले काही दिवस थांबलेली मासेमारी सुद्धा आज काहीशी चालू झालेली दिसली. कोंडुरा बीचवर समुद्रकिनारी असलेल्या काळ्या कातळावर धडकणार्या लाटा बघताना गंमत वाटली. या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेऊन आम्ही दुपारपर्यंत निवतीला परत आलो याचं कारण आता पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारी मासेमारी, म्हणजेच "रापण" बघायला जायचं होतं. जेवण आटपून आम्ही चार वाजेपर्यंत बीचवर पोहोचलो तेव्हा रापणासाठी कोळी बांधव सज्ज झाले होते. हा अनुभव घ्यायला प्रत्यक्षात तिथे जाऊनच एकदा बघायला हवं. संध्याकाळी जवळच्या प्रसिद्ध अशा "निवती रॉक्स" किंवा "निवती गोल्डन रॉक्स" वर चढून एका जागी थांबून रापण बघत बसलो. मोठं विलोभनीय असं दृश्य. खूप दिवसांनी असा अविस्मरणीय अनुभव मिळाला.
चौथ्या व शेवटच्या दिवशी निवती बीचवरून चेक आउट करून वेंगुर्ल्याला जायला निघालो. सर्वप्रथम, वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसला जायचं ठरवलं. मनात थोडी शंका होती की लाईट हाऊस बघायला आज सोडतील की नाही. पण तिथे गेल्यावर नशिबाने आम्हाला प्रवेश मिळाला. समुद्राच्या लागून असलेल्या एका पठारावरच्या टोकावर लाईट हाऊस उभारण्यात आलेलं आहे. जीने चढून वर गेल्यावर आम्हाला एक भारावून टाकणार दृश्य दिसलं. विस्तीर्ण पसरलेला अथांग समुद्र, पश्चिमेकडून वाऱ्याशी स्पर्धा करत येणारे ढग, निळसर आकाश आणि त्या आकाशाचा निळा रंग पळवून निळं झालेलं समुद्राचे पाणी मोठ्या दिमाखात सूर्याचं ऊन पडून चमकत होतं. या अद्भुत देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो.
वेंगुर्लाच्या आसपास फिरता येण्यासारखं बरंच काही आहे. परंतु आज शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मोजक्या जागांना भेट द्यायचं ठरवलं. वेंगुर्ले शहरात स्थित असलेल्या डच वखार या स्थळाकडे गेलो. १६६५ साली बांधलेल्या या वखारीचे आता फक्त भग्नावस्थेतले अवशेष शिल्लक आहेत. या परिसरातले मोठ मोठाले वृक्ष, आजूबाजूला वाढलेली झाडं झुडपं आणि त्यातून चाललेली असंख्य कीटकांची किर्र ... किर्र...... , यातून एक गूढ वातावरण तयार झालं होतं. वखारीच्या प्रवेशाजवळच एक मोठाला वृक्ष दिसला. त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या फांद्या आणि खालपर्यंत आलेल्या पारंब्या त्याच्या प्राचीन अस्तित्वाच्या खुणा सांगत होत्या. न जाणो भूतकाळाच्या कित्येक घटनांचा तो प्राचीन वृक्ष साक्षीदार असेल.
दुपारचं जेवण आम्ही वेंगुर्ल्याच्याच प्रसिद्ध रेडकर बंधू भोजनालयात जेवून अगदी तृप्त होऊन बाहेर पडलो. संध्याकाळी रेडीच्या किल्ल्यावर जायचं ठरवलं. वेंगुर्ल्यावरून रेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच श्री वेतोबा देवस्थान आहे. भुताखेतांपासून आणि इतर वाईट शक्तींपासून गावाची आणि गावकऱ्यांची राखण करणाऱ्या या क्षेत्रपाल देवाबद्दल मनात उत्सुकता होती. त्याचं दर्शन घेण्याचा योग एकदाचा या सहलीनिमित्त घडून आला. आरवली गावात स्थित हे वेतोबाचं मंदिर खूप देखणे आहे.
वेतोबाचं दर्शन घेऊन पुढे रेडी गावातल्या रेडीच्या किल्ल्यावर गेलो. या किल्ल्याचे अधिकृत नाव यशवंतगड हे आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क करून किल्ल्यावर पायी जाता येतं. किल्ल्याची तटबंदी आणि मुख्य किल्ला यामध्ये एक खोल खंदक बांधण्यात आलेला पाहायला मिळतो. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपल्याला त्या काळात बांधण्यात आलेल्या खोल्यांचे अवशेष बघायला मिळतात. या खोल्यांच्या भिंतीवर आता मोठाले वृक्ष आणि वेली वाढलेल्या दिसतात. या वृक्षांची मुळे अगदी भिंतीमधून आरपार खोलवर गेलेली आहेत. एकंदरीत किल्ल्याचे बांधकाम अजूनही भक्कम अवस्थेत आहे. किल्ल्याच्या रचनेमध्ये संरक्षणाला मुख्यत्वे प्राधान्य दिले गेले असल्याचे जाणवते. किल्ल्यावर आल्यावर एका पायवाटेने बुरुजावरून चालत किल्ल्याच्या टोकाशी पोहोचल्यावर आपल्याला रेडीची खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमाचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळते. सूर्य आता पश्चिमेला झुकला होता. सूर्यास्त बघायला आम्ही जवळच असलेल्या तेरेखोल किल्ल्यावर गेलो. हा किल्ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे सुस्थितीत आहे. किल्ल्यावर हेरिटेज हॉटेल सुद्धा बांधण्यात आलेले असल्यामुळे राहण्याची उत्तम सोय आहे. येथे एक रेस्टॉरंटही आहे. तिथेच बसून थंड पेय पित समोरच्या सूर्यास्ताचा देखावा बघत राहिलो. समोर गोव्याच्या भूमीचे सुद्धा दर्शन घडत होते. तेरेखोल किल्ला हा तेरेखोल नदीच्या एका बाजूला स्थित आहे. पलीकडे गोव्याचा क्वेरीम बीच दिसतो. अस्ताला चाललेल्या सूर्याची किरणे समोरच्या किनाऱ्यावरील वाळूला सोनेरी मुलामा दिल्यासारखी भासत होती.
हे सगळे प्रत्यक्षात अनुभवताना आणि घरी आल्यावर पुन्हा पुन्हा आठवताना परत एकदा बोरकरांच्याच एका कवितेतल्या या ओळी डोळ्यासमोर आल्या.
भेटी जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा |
भाग्य केवढे आपुले,
आपुली चाले यातूनच यात्रा ||
आपुली चाले यातूनच यात्रा ||
जिथे बेडवर पडल्या पडल्या समुद्र दिसत रहायला हवा. माहितेय का कोणाला असे ठिकाण?
०. क्युबा अगोंद, अगोंद, गोवा
१. बोगमालो बीच रिसॉर्ट, बोगमालो, गोवा
२. फोर्ट तेरेखोल हॉटेल (रूम टाइप निवडून घ्यावा लागेल)
३. हॉटेल गजाली वेंगुर्ला. (पॉश नाही पण लोकेशन आणि व्ह्यू.
समुद्रात सूर्योदय पाहणे शक्य )
४. कोहिनूर रिसॉर्ट, रत्नागिरी
५. अभिषेक रिसॉर्ट, भंडारपुळे
६. यू टॅन रिसॉर्ट, उत्तन
७. सिदाद दि दमण, देवका बीच रोड, नानी दमण.
हे सर्व अगदी बेडमधून समुद्र थेट.
बाकी नुसते कोणत्या तरी एका कोपऱ्यातून सी व्यू बरेच असतात.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.