Thursday, June 3, 2021

अंदमान - एक अविस्मरणीय सफर

 अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो. पहिल्या दिवशी फार वेळ नसल्याने, रुमवर फ्रेश होऊन, लगेचच कॉर्बिन्स कोव्ह या पोर्ट ब्लेअरच्याच एका जवळच्या बीचवर गेलो. दुपारी ३ ते ५ असा चांगला वेळ गेला. सायंकाळी ५ वाजताच सूर्यास्त झाल्याने कोजागिरीच्या चंद्राचा आनंद घेता आला.

कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
१.
Corbyn's cove

२.
Corbyn's cove

३.
Corbyn's cove

४. तोच चंद्रमा नभांत
Corbyn's cove
त्यानंतर, गाडी लगोलग सेल्युलर जेलकडे वळवली. पण त्या दिवशी जेल बंद असल्याने फक्त 'लाईट आणि साऊंड शो' बघितला. तो अगदी अवश्य बघण्यासारखा आहे. सावरकरांसारखेच बंगाल आणि पंजाब मधले असंख्य क्रांतिकारक या तुरुंगात होते आणि त्यातले काही तर तिथेच छ्ळवणुकीला बळी पडले. जेलचा इतिहास आणि त्यावेळची आतली परिस्थिती, अगदी जिवंतपणे तुमच्या समोर उभी करतात तेंव्हा अंगावर काटा उभा रहातो.
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघायचे होते. पण तिकडे चार साडेचारलाच कोंबडे आरवायला सुरवात झाली. सकाळी ८ वाजता नाश्ता आटोपून ठीक ९ वाजताची बोट गांठली. एक तासाचा प्रवास करुन आम्हाला नॉर्थ बे आयलंडला नेण्यांत आले.

५.
नॉर्थ बे कडे जाताना
North Bay

६. जेटी
jetty

७. नॉर्थ बे आयलंड
North Bay

तिथे मोठी बोट किनार्‍यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आम्हाला एका छोट्या होडीत बसवण्यांत आले.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवण्यांत आली होती. वर ऊन होते, म्हणून आमच्या सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरले. पुढच्या २० मिनिटांत आम्हाला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी झाली. त्यानंतर आमच्या चॉईस प्रमाणे आम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत आले. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील!
त्या छोट्या खोलीत तो स्कुबाचा वन पीस घालताना माझी अवस्था अगदी कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुम सारखीच झाली. त्यातून मागचे झिप लागेचना! शेवटी तशाच अवस्थेत बाहेर येऊन एकाकडून ते झिप लावून घेतले.बाहेर चिक्कार महिला वर्ग बसला होता. पण त्यांना या साठीपार बुढ्ढ्याकडे बघण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्या बुढ्ढ्यानेही लाज कधीच सोडून दिली असल्यामुळे, काही प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही दोघंही म्हातारा-म्हातारे त्या तसल्या ड्रेसमधे डुगुडुगु चालत, कासवे जशी पाण्याकडे जातात तसे पाण्यांत उतरलो. इतरांचे ट्रेनिंग चालू असल्याने आणि त्या दिवशी इन्स्ट्रक्टर लोक कमी असल्याने, आम्हाला आमचा नंबर येईपर्यंत पाण्यांत डुंबण्याचा सल्ला मिळाला.
साधारण पाऊणतास पाण्यांत डुंबल्यावर आमचे ट्रेनिंग सुरु झाले. मास्क चढवून आणि मागे ऑक्सिजन सिलिंडर लावून, तोंडानेच श्वास-उच्छवासाची क्रिया जमायला थोडा वेळ लागला. पाण्याखाली तोंड बुडवून तसा सराव केल्यावर दोन माणसांनी आमची बखोटी धरुन, आम्हाला पाण्याखाली नेले. खालचे दृश्य पाहिले आणि आम्ही थरारलो. पुढचा अर्धा तास, खालचे अविस्मरणीय जिवंत कोरल्स आणि रंगीबेरंगी मासे बघण्यांत कसा गेला ते कळलेच नाही. ते हलणारे, आपल्या चाहुलीने स्वतःला मिटून घेणारे, वेगवेगळ्या आकाराचे कोरल्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आमचे अंडर वॉटर फोटो काढून त्याची एक सीडीही करुन देण्यांत आली. बाहेर आल्यावर तो स्पेशल सूट अंगापासून वेगळा करायला, पुन्हा एकदा लोकांची मदत घ्यावी लागली. सगळे आवरेपर्यंत थोडा उशीर झाला. आमची बोट वाट पहात उभी होती. बोटीवरचा माणूस आम्हाला शोधायला आला होता. बोटीत बसल्यावर आमचा प्रवास रॉस आयलंडकडे सुरु झाला.

क्रमशः

रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.

१. My Dear

२.
more

३.
Black

तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.

४.
Garden

दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्‍यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्‍यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.

५.
Tsunami

त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.

६.
Benches

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.

७.विजयनगर बीच-हॅवलॉक
vijaynagar

८.
vijaynagar

९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
Resort

१०. राधानगर बीच - हॅवलॉक

Radhanagar

११.
radhanagar

१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक

kala patthaar

१३.
kala Patthar

१४. आमची परतीची क्रूज

Cruise

हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्‍याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्‍यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्‍यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.

१५. स्पीडबोटीतून उतरताना

Boat

१६. गुहेकडे जाताना

guha

१७.
road

१८. परतीचा प्रवास

return

बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.

१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.

L & S

२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत

jail

बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?

एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.

१. सावरकरांच्या कोठडीकडे जाताना- शेवटची कोठडी सावरकरांची.

way

२. आंत शिरताना

saavarkar

३. नतमस्तक

jayostute

४. कोलू

kolu

५. कोलू फिरवताना मॉडेल

kolu

६. बेड्या

Bedya

७. सेल्यूलर जेल

jail

काय मग? लग्नानंतर कुठे जाणार फिरायला?" हा लग्नसमारंभात भेटायला येणार्‍या लोकांनी विचारायच्या टॉप १० प्रश्नांपैकी एक हे आता कळून चुकले होते. मला त्या प्रश्नांची सवय झाली असली तरी लोकांना माझ्या उत्तराची सवय नसावी बहुतेक. मी सांगायचो "अंदमान" आणि लोक मग मला तिथे काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठविल्यासारखे "अंदमान?!?" असा प्रतिप्रश्न विचारायचे.
काहि लोकांनी अंदमान म्हटल्यावर विचारलेल्या शंकांनी तर माझं भलतंच मनोरंजन झालं
"स्वा. सावरकरांचा जन्म तिथलाच ना रे?"
"अरे तिथे फक्त आदिवसी रहातात ना.. तिथे जाणार आहेस?"
"ओह अंदमान.. मग लक्षद्वीप पण करणार का?"
"तिथे जायला सरकारची परवानगी लागते ना?"
"तिथे १० दिवस काय करणार? फक्त सेल्युलर जेल आणि १-२ बिचेस इतकच आहे ना तिथे बघायला?"
हे प्रश्न ऐकले आणि जाणवलं की भारताच्या ह्या अविभाज्य भागाबद्दल अजून बरेच समज-गैरसमज आहेत. खरंतर तेथील अनुभव, वर्णन लिहावं यासाठी स्फुर्ती लोकांच्या ह्या अशा प्रश्नांनी दिली. :)

काहि अंशी मजेचा भाग सोडला तरी अंदमान बेटे भारतातील सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत हे नक्की. केंद्रशासित असल्याने म्हणा, भारतापासून भौगोलिकदृष्ट्या दुर असल्याने म्हणा, कमी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा काहि सरकारी धोरणे/नियम यामुळे म्हणा ही बेटे अजूनही केवळ आणि केवळ सौंदर्यवान आहेत. जगातील सर्वोत्तम डायविंग साईट्स पैकी एक असणारे अंदमान विदेशी पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते आहे.

असो, तर (एकदाचे) लग्न आणि अंदमानचे वेध दोन्ही एकत्रच लागले. "कोणत्या टूर बरोबर चालला आहेस?" ह्या प्रश्नकर्त्यांना "स्वतःच सगळं अरेंज केलं आहे" हे सांगून अजून चिंतेत टाकत होतो. एरवी दारातूनच निश्चिंत टाटा करणारे आई-बाबा सून आल्याबरोबर चेन्नईच्या गाडीत बसवायला थेट सीएस्टी पर्यंत आले. अगदी "गाडी सुटली रुमाल हलले.. " वगैरे सीन झाला नसला तरी त्यांना दिसेनासे होईपर्यंत अच्छा केलं आणि आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. ट्रेनमधील मजेशीर प्रवासी नेहमीप्रमाणे माझी करमणूक करत होते. मजल दर मजल करीत चेन्नई आलं आणि तमिळ गलक्यातून वाचवणारी "प्री पेड रिक्षा" सर्विस बघुन आनंद झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी अंदमानचे विमान होते. अंदमानमधी वास्तव्याचे कन्फर्मेशन, विमानाची वेळ नक्की करून, रिक्षावाल्याला सकाळीच बोलावून लवकरच झोपलो. सकाळी वेळेवर आलेला रिक्षावाला सोडल्यास सांगण्यासारखं काहि विषेश घडलंच नाहि. आमच्या विमानाने चेन्नईहून उड्डाण केलं आणि भारताची मुख्यभूमी आम्ही त्या तिथे पलिकडे तिकडे जाण्यासाठी सोडली.

दोन तास विमानात काढले. विमानात अर्ध्याहून अधिक प्रवासी परदेशी होते. त्यांना अंदमानमधील विविध ठिकाणांबद्द्ल इत्यंभूत माहिती (आपल्या लोकांना नसलेली) होती हे विषेश. असो, तर विमानाने आपले नाक खाली केले आणि आम्ही खिडकीच्या काचेला लावले. समोर हिरव्या कंच वनश्रीने नटलेली बेटं, निळेशार पाणी आणि त्यांना दुभागणारी किनार्‍याची चंदरी रेघ हे तीनच रंग कलिजा खलास करत होते..

(वरील चित्र जालावरून साभार)

ते दृश्य बघूनच पुढील दहा दिवस पृथ्वीवरील एका वेगळ्या नितांत सुंदर भागात जाणार असल्याची खात्री पटली. "अहा!" या अर्थाच्या बहुभाषिक सार्वजनिक चित्कारांमधेच विमानाने जमिनीला पाय टेकले. पोर्ट ब्लेअर हा एक छोटेखानी विमानतळ. भारतातील बर्‍याचश्या शहरांप्रमाणे मुळ वायुदलाचा विमानतळ जो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. बाहेर आलो. टॅक्सीवाले बरेच होते पण भारतातील इतर शहरांच्या विपरीत टॅक्सीवाले भलतेच सोज्वळ निघाले. एकदा फारतर दोनदा टॅक्सी हवी आहे का विचारले आणि नको म्हटल्यावर मागे लागायचे नाहित. एखाद्या देशाचे कस्टम्सवाले त्या देशाचे आणि गावचे टॅक्सीवाले त्या गावच्या स्वभावाचे पहिले दर्शन घडवतात असे म्हणतात ते काहि खोटं नाहि. पुढे संपूर्ण ट्रीपभर आम्हाला ह्या त्रास न देण्याच्या किंबहूना मदतीसाठी तत्पर वागणूकीचा प्रत्यय येत राहिला.

तर आम्ही हॉटेलवर ब्यागा टाकल्या-जेवलो आणि तडक बाहेर पडलो. अंदमानला जायचे ठरल्यापासून "सेल्युलर जेल" - सावरकरांच्या व इतर अनेक क्रांतीकारकांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु- बघण्याची, अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आराम वगैरे न करता तडक निघालो. तसंही पंढरपूरला गेल्यावर आधी विठोबाचं दर्शन आणि मग इतर रिवाज करायचे असतात त्याप्रमाणे अखिल भारताच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याचे दर्शन घेऊन पुढील बेत आखणे योग्यच होते.

रिक्षा थांबली आणि समोर "सेल्युलर जेल" लिहिलेली उंच वास्तु उभी होती. एकेकाळी असंख्या क्रांतीवीराचे भक्तीस्थानच. इथे आलो की त्या देशभक्तांच्या कार्याला नवा अर्थ प्राप्त व्हायचा.

आत शिरलो आणि समोरचीच्या प्रमाणबद्ध वास्तुकडे बघतच राहिलो. अतिशय प्रमाणबद्ध रचना आणि त्यामुळे सौंदर्याचे दर्शन करवणारी ती इमारत एकेकाळी कितीतरी जुलुम बघत होती. एकेका 'सेल' समोरून जाताना मनात भावनांचे काहूर माजले होते. एकेका क्रांतीकारकाला ह्याच सेल मधे ठेवले जायचे. त्यात जेलर हा कर्दनकाळ! मुळ भूमीपासून इतक्या दूरवरचा जेलर म्हणजे तेथील अनभिषिक्त सम्राट. त्याने इथे काहिहि केले तरी बातमी बाहेर जाणे कर्मकठीण. ह्या जेलमधे फक्त जन्मठेपेचे आणि फाशीचे कैदीच येत. अश्याच वेळी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगमन झाले. त्यांचा दरारा इतका की त्यांच्या साठी एका कोपर्‍यातील सेल दिला गेला आणि त्यांच्या बाजुचा सेल रिकामा ठेवला गेला. त्यांना आणले हे इतके गुप्त होते की त्यांच्या भावाला वर्षभर हे माहित नव्हते की सावरकर व ते एकाच जेलमधे आहेत.

जेव्हा सावरकरांचा सेल जवळ येत होता तेव्हा मन धडधडत होते.. हा सेल अजूनहि तसाच जपला आहे. सावरकरांच्या पळून जाण्याच्या भीतीमुळे दोन दरवाजे असलेल्या त्या सेल मधे एकटाच आत गेलो.. थोडावे़ळ एकटाच थांबलो.. मन आणि डोळे दोन्ही भरून आले. हीच ती जागा जिथे तात्याराव वर्षानुवर्षे होते. त्यांना हे आकाश असेच दिसत असेल. (चौथा फोटो सावरकरांच्या सेल मधून दिसणारा बाहेरच्या जगातील तुकडा दाखवतो) ह्या गजांतून ह्याच परिसराच्या तुकड्याकडे बघत जेव्हा त्यांना पेन पेपर नाकारला तेव्हा भिंतीवर खंडकाव्य लिहिले असेल. शरीरावरचा रोम अन रोम पुलकित झाला होता. जड अंतकरणाने त्या सेल मधून बाहेर निघालो.

संध्याकाळ होऊन सूर्य विझेपर्यंत असाच अख्ख्या जेलभर भटकत होतो. जिथे फाशी द्यायचे ती जागा, कोलू चालवायला लावायचे ती जागा बघून अंगावर येणारा काटा घालवता जात नव्हता. संध्याकाळी होणारा लाईट अ‍ॅंड साऊंड शो हा देखील सुंदर. त्या जागेची उत्तम माहिती देणारा त्याच बरोबर स्वा. सावरकर, नेताजी बोस, योगेंद्र शुक्ला, बटुकेशवर दत्त यांच्या आठवणी जागवल्या जातात. अत्यंत धीरगंभीर आवाजात हे जेल आपल्याला त्याची कहाणी सांगते आणि आपण भारवलेल्या स्थितीत बाहेर पडतो.

हे जेल 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील एक काळी तितकीच स्फुर्तिदाय स्मृती जागृत ठेवतच आहे त्याच बरोबर वेळच्यावेळी डागडुजी, सफाई व रंगरंगोटी होते आहे हे बघून खूप बरे वाटले. प्रत्येकाने बघावेच असे हे स्थळ.. प्रत्येकाने इतिहास शोधण्यासाठी तर बघावेच पण स्वतःला शोधाण्यासाठी जरूर बघावे!

पोर्ट ब्लेअर हे शेवटी एक शहर आहे. एक संपूर्ण पर्यटन स्थळ! त्यामुळे कितीही छान असलं तरी सगळीकडे पर्यटक असायचे. अस्वच्छता, दुर्गंधी, फेरीवाले, धक्काबुक्की यांचा त्रास नसला तरी जाणवण्या इतपत वर्दळ होतीच. व्यावहारीक भाषा हिंदी, त्यामुळे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आल्यासारखं वाटेना. आम्ही पोर्ट ब्लेअरला तीनच दिवस रहाणार होतो. बाकी बराचसा वेळ हॅवलॉक आयलंड ह्या अजून पूर्वेला असणार्‍या एका दूरस्थ बेटावर काढण्याचे ठरवले होते. त्यामुळे ह्या दिवसांमधे रॉस आयलंड व जॉली बॉय करावे हा एकूणच हॉटेलवाल्यांचा / तेथील रिक्षावाल्यांचा ग्रह आणि आग्रह होता.

भारतापासून दूर त्या तिथे पलिकडे तिकडे फक्त पोर्ट ब्लेअर आहे; आणि जवळ असणारे रॉस आयलंड व जॉली बॉय ह्या सुंदर जागा आहेत हा अंदमानबद्दल असणार्‍या अनेक समजांपैकी एक. त्यातील जॉली बॉय हे स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या आधी अंदमानला जाऊन आलेल्यांनी जॉली बॉय बघितले होते, त्यांनी त्सुनामी नंतर जॉली बॉय आहे का ते बघ असे बजावले होते. ३-४ तासांच्या भेटीत प्रत्येक व्यक्तीवर अंदमानच्या समुद्राने त्याच्या रंगाने घातलेली मोहीनी मी त्यांच्या डोळ्यात बघितली होती आणि तेव्हाच मी अंदमानला जायचे ठरवले होते.

मात्र इथे आल्यावर जसजशी अंदमानची माहिती कळू लागली तसे मला रॉस आयलंड व जॉली बॉय बघण्यापेक्षा अंदमानच्या अंतरंगात शिरावेसे वाटू लागले. अंदमानला बरेच आदिवासी आहेत ही माहिती खरी आहे (मात्र फक्त आदीवासी नाहीत :) ). अंदमानला आदिवासींच्या एकूण ६ जमाती आहेत त्यातील दोन तर नरभक्षक आहेत. सुदैवाने भारतीय "मुलवासी जमाती संरक्षण कायदा, १९५६" (Aboriginal Tribes Regulation, 1956) मुळे ह्या सगळ्या जमाती संरक्षित आहेत.

तर मध्य अंदमानमधी बारतांग आयलंडला जाण्याच्या रस्त्यावर या जमातींपैकी जारवा जमातीमधील लोकांना बघायची संधी असते हे कळल्यावर रॉस आयलंड वगैरे ऐवजी अचानक बारतांग आयलंडला जायचं नक्की केलं. सकाळी लवकर उजाडत असल्याने पहाटे चारला ठरवलेली गाडी आली आणि त्यातून आमच्याच हॉटेलमधील ३-४ जण आणि आम्ही दोघे बारतांग आयलंडला निघालो. सूर्य उजाडायचा होता.. नीटसे फटफटलेदेखील नव्हते. परिसराचा अंदाज फिकट होत चाललेल्या आकाशाच्या काळ्या रंगामुळे येत होता.. प्रकाश वाढु लागला तोपर्यंत आमची गाडी घनदाट जंगलातून चालली होती. सुंदर निबिड अरण्य. भल्या सकाळी उठल्याने मंडळी पेंगुळलेली होती. लवकरच त्यांनी "होय होय होय - नाहि नाहि नाहि" सुरू केलं ;) . मग मी आणि ड्रायव्हर दोघेच जागे असल्याने त्याला झोप येईल या भीतीने मीच त्याच्याशी गप्पा मारू लागलो. सुरवातीला बुजत बोलणारा आमचा ड्रायव्हर हळुहळु नीट बोलु लागला.
"हा बघा.." डायवर सांगत होता...निबिड अरण्यात अचानक एक दलदलीचा पॅच लागला तिथली सगळी झाडं तुटली होती.. फक्त पाण्यातून बाहेर आलेली निष्पर्ण खोडं शिल्लक होती.."इथेही दाट जंगलच होतं.. मात्र एका लाटेने हे हाल झाले"
फक्त एका लाटेचा इतका तडाखा बघूनच हतबुद्ध झालो. पुढे त्सुनामीचे ठिकठिकणी लागलेले व्रण बघत जात होतो.

जसजसं जारवा रिझर्वस जवळ येऊ लागले तसे तसे रस्ते लहान आणि शंका मोठ्या होऊ लागल्या. मंडळी उठली होती. डायवर बोलता झालेला पाहून त्यांनी शंकांना वाट मोकळी करून द्यायला सूरवात केली
"काय हो? ते जारवा गाडीतून काहि उचलणार तर नाहित ना?"....
"नाहि"
"त्यांच्याकडे शस्त्र असतात??" ...
"हो.. पण घाबरू नका मिलट्री बरोबर असेल आपल्या"
"खातात काय हो ते?"..
"रानडुकरांची वगैरे शिकार करतात.. बाकी शेती वगैरे नाहि.. त्सुनामीपासून सरकार काहि धान्यांच्या पिशव्या त्या भागात टाकते असे ऐकलंय"
"ते घरात रहातात का गुहेत?"
"घरांत.. आत जंगलात त्यांच्या बांबुच्या झोपड्या आहेत."
"आपल्याला दिसतील?"
"नाहि. मीदेखील अजून बघितलेल्या नाहित"
"त्यांना हिंदी येतं?"
"नाहि. मात्र मिलिट्रीवाल्यांनी त्यांना "बचाव" शब्द शिकवला आहे :) "
यावर अख्खी गाडी (उगाच) हसली.
"बरं आता आपल्याला परमिट मिळेल.. मग दर दोन गाड्यांच्या मागे एक आणि पुढे एक अशी मिलिट्री व्हॅन असेल... गाडीच्या काचा उघडण्यास मनाई आहे.. वाटेत फोटो काढण्यास मनाई आहे.. जारवा दिसले तर त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करण्यास, त्यांना खायला देण्यास मनाई आहे.. गाडी ताशी ५०कीमीपेक्षा जास्त वेगात चालवणे सक्तीचे आहे.. तेव्हा पुढचे ४० किमीच्या पट्यात गाडी थांबणार नाहि. समोर टॉयलेट आहे "
सर्व सुचना एका दमात दिल्याने सगळ्यांना खूपच शंका होत्या मात्र शेवटच्या सुचनेमुळे त्या शंका थोपवून लोक लघुशंकांकडे लक्ष पुरवण्यास पळाले ;)
अर्ध्या तासात परमीट मिळाले व सगळ्या गाड्या एका रांगेत उभ्या राहिल्या. गाडीवानाने किल्ली फिरवली आणि स्त्रीसमुहाने का कोण जाणे देवाचे नाव वगैरे घेतले/पुटपुटले.. समोरच्या गाडीतून "शिवाजी महाराज की जय" वगैरे गर्जनाही झाल्या.. एकूणच काय, तर आमच्या डायवरप्रमाणेच इतर डायवरांनीही उत्सुकता ताणण्याचे आणि काहिसे घाबरवण्याचे व्यावसायिक कसब छान दाखवले होते.
एखाद्या मोहिमेवर निघाल्यागत आमची गाडी सुसाट निघाली. एकमार्गी रस्त्यावर ओवरटेकिंग करण्यास मनाई असल्याने एका वेगात एका रांगेत अत्यंत घनदाट अरण्यातून चाललेल्या गाड्या छान वाटत होत्या. पहिली काहि मिनीटे गाडी श्वास रोखून आणि जीव डोळ्यात आणून मंडळी परिसर बघत होती. न जाणो एखादा जारवा झाडावर दिसायचा. दहा एक मिनीटे झाली तरीही गाडीचे चालक, मिलिट्रीचे जवान आणि घाबरलेले उत्सूक वेडे पर्यटक सोडल्यास कोणत्याही जमातीचा मागमुस दिसेना. तेव्हा लोकांच्या दडलेल्या शंकांना कंठ फुटु लागला
" त्यांना खायला का द्यायचं नाहि?"
"त्यांना मिठाची सवय नाहि आहे. आजारी पडतात ते"
इतक्यात एक त्सुनामी प्याच आला
"ह्या लोकांपैकी त्सुनामीमधे बरेच गेले असतील नाहि बिचारे!"
"ह्यांच्यापैकी? एकही नाहि.. ह्यांना आधीच कळलं होतं बहुतेक .. घर सोडून संध्याकाळीच डोंगरावर चढून बसले होते"
इथे सगळ्या गाडीला आश्चर्यचकित व्हायलाही पुरेसा वेळ मिळाला नाहि .. कारण गाडीने एक वळण घेतले आणि समोरच एकही वस्त्र न पांघरलेले, हातात लाकडी काठ्या, अंगभर राख फासलेले एक कुटुंब (किंबहूना ५-६ मुलं, २ स्त्रीया आणि एक पुरुष) आमच्या गाड्यांकडे बघत हसत होते. गाडीतील सगळेजण त्या, फक्त डिस्कव्हरी चॅनेलमधेच दिसणार्‍या, आदिवासी मंडळींकडे भीती, आश्चर्य, रोमांच, कणव वगैरे अनेक भावांच्या मिश्रीत नजरेने बघत होते..
ते नजरेआड गेले आणि गाडीने रोखलेला निश्वास एकत्रच सोडला.
"ह्यांना शिक्षण दिलं पाहिजे. फक्त आपणच जगातल्या सगळ्या सोयी वापरायच्या हे काही बरोबर नाहि" इतका वेळ गप्प असणार्‍या, अन भल्यापहाटे मनसोक्त मेकअप केलेल्या एका काकुंचा सामाजिक बाणा अचानक जागृत झाला
"कशाला? किती मजेत दिसत होते ते!" गाडीतील बायकांपैकी फक्त आपल्यालाच सांसारिक विषय सोडून अश्या विषयांवर बोलता येते असा स्वतःच करून घेतलेला समज तुटल्याने दुखावलेल्या दुसर्‍या काकु फणकारल्या
"मजेत? बिचार्‍यांकडे धड कपडे देखील नव्हते. भारताने अश्या जमाती टिकवून काय फायदा? किती थंडी वाजत असेल त्यांना रात्री. काल मी तर ब्लँकेट घेऊन एसी बंद करून झोपले होते" मेकअप काकुंनी अन्न वस्त्र निवार्‍याच्या मुलभुत प्रश्नाला हात घातला
"जाऊदे, भारत अमेरिकन होत चालला आहे तितका पुरेसा नाहि का? आता ह्यांना कशाला त्या रॅटरेस मधे ओढताय?" मेकअप काकुंच्या अमेरिकन मुलाची कहाणी ऐकवुन झाली होती त्याचा वचपा असा!?
ही मजा अजून चालली असली पण डायवर अचानक "ते बघा अजून" म्हणाला आणि मंडळी दुसर्‍या जारवा मंडळींकडे बघण्यात गुंतली. इथे ह्या जारवांचे आमच्याकडे लक्षच नव्हते(तसे ते दाखवत नव्हते). एक कुठलेसे फळ सोलण्यास सगळे गर्क होते. पुढे हि मंडळी दिसत गेली, जाताना तसेच परतीच्या वाटेवरही. दिसायला आफ्रिकन वाटले तरीही ते भारतीय आहेत, माझ्याप्रमाणे तेही (त्यांना जाणीव असो नसो) याच देशाचे नागरीक आहेत आणि मला ही गोष्ट त्यांच्याशी जोडते आहे ही जाणीव फार वेगळी होती. वंश, धर्म, नीती-अनीती या सगळ्याच्या पलिकडे पोहोचलेल्या (किंवा ह्यासगळ्याच्या अलिकडे असलेल्या) आणि देश, नागरीकत्त्व वगैरे न मानणार्‍या ह्या निसर्गपुत्रांशी आपली (बळंच) नाळ जोडायला नागरीकत्त्वच वापरावं लागावं हा केवढा विरोधाभास!

ह्या नव्या (काहिशा वदग्रस्त) ट्रंक रोडने (नॅशनल हायवे) ह्या जारवांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढला आहेच. गेल्या ७-८ वर्षांत त्यातील काहिंनी आपले शब्द शिकायला सुरवात केली आहे. सगळं जग सारखंच एका वासाचं, एका रंगांचं बनवु पहाणार्‍या तथाकथित 'आधुनिक' माणसांचा परिणाम पशुपक्षांवर दिसु लागला आहे, तर मग ह्या माणसाच्याच जमातीवर परिणाम न दिसेल तरच नवल. आता हे किती योग्य, अपरिहार्य आणि किती क्लेशकारक हे ज्याचे त्याने ठरवावे.
*१. माझे व्यक्तीशः अश्या भागांतून रहदारी / रोड जावा की नाहि याबद्दल ठाम नसलं तरी बरेचसे नकारात्मकतेकडे झुकलेले मत आहे. त्यामुळे माझे काहि एकांगी अनुभव न सांगता / टिप्पणी न करता नका इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विकी आणि जालावरील इतर संदर्भ वाचावेत असे सुचवतो.
२. बाकी आता रोड आहेच, तर ह्या जमातींचे 'आधुनिकी'करण होण्याआधी भेट देऊन घ्या हा एका अर्थी स्वार्थी सल्ला!
*

असो. तर पुढे बारतांग आयलंड हे मध्य अंदमान मधील बेटावरील जिवंत पत्थराच्या गुंफा(living stones) बघायला जायचे होते. अश्या गुंफा बघायला इंडोनिशिया, जपान वगैरे ठिकाणी जाणे जमत नसेल तर अश्या गुंफा भारतात आहेत. अजूनही तिथे दर क्षणाला विश्व नवनिर्माण करत आहे. एक थंड, मनमोहक, लांब गुंफा हे त्याचे वैशिष्ट्य तर आहेच पण त्याहीपेक्षा रोचक वाटते ते सृष्टीचं आपल्यापुढे घडताना पाहणं. ह्या गुंफा कशा बनल्या वगैरे गोष्टीत रस असणार्‍यांनी पुढील फलक वाचुन काढावेत

ह्या गुंफांना जायचा रस्ता देखील मोठा रोचक आहे. एका स्पीड बोटीतून बॅकवॉटर्समधून तुम्ही अर्धातास जाता आणि मग अचानक एका तिवराच्या जाळीत बोट घुसते. चारी बाजूला तिवराची जाळी आणि बोगद्यात आपली बोट हा अनुभव (नावाड्याने तिवरात मगरी असतात सांगितल्याने अधिकच) रोचक वाटला.


आमचा ह्या गुंफांमधील वाटाड्या देखील मनापासून माहिती देत होता. इतर पर्यटनस्थळी गाईड नावाचे प्राणी जो बॉलीवूडचा इतिहास सांगतात त्यापेक्षा याचे माहितीपर वर्णन निश्चितच सुखावह होते. त्यात त्याने गुहेत शेवटी काहि क्षण सगळ्यांना विजेर्‍या आणि आवाज बंद करायला सांगितले. आणि तो मिनीट डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाहि असा अंधार बर्‍याच दिवसआंनी अनुभवला. प्रकाश आणि आवाजाचा अभाव सगळ्यांनाच हवाहवासा वाटला, आवडला.

इथे आम्हाला भेटलेल्या एका आजींचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाहि. ह्या गुंफेत दुसर्‍या एका ग्रुपबरोबर एक अमरावतीच्या आजी आल्या होत्या. त्यांनी आलेपाकाच्या वड्या पुढे करून आपणहून दोस्तीचा हात (वड्या) दिल्या आणि मग आमच्या प्रश्नांची वाट न पाहता सांगु लागल्या.. "आता मी ८२ वर्षांची आहे, भारतात हे इतकंच बाकी होतं, कुठुनसं कळलं हा मुंबईचा ग्रुप चाललाय म्हटलं माझं नाव आधी घाला. हे झालं की मग काय माझा जीव अडकायला नको.." संपूर्ण भारत भ्रमण केलेल्या त्या आजींच्या इच्छाशक्ती आणि निर्धाराच्या शंभरावा हिस्सा त्यांच्या वयात आपल्यात टिकला तर किती नशिबवान असु असे वाटून गेले आणि त्यांना बोलूनही दाखवले. त्या नुसत्याच हसल्या आणि एक श्रीखंडाची गोळी मिळाली :)

अंदमानच्या सफरीवर निघताना बारतांग / जारवा रिझर्व्स ही नावे माहित होती मात्र तिथे जायचा योग येईल असे मात्र वाटले नव्हते / ठरविले नव्हते. मात्र आता ही ठिकाणे हा अनुभव घेण्याच्या निर्णयाचे समाधान वाटते. अंदमानच्याही एका दूरस्थ कोपर्‍यातील हा अनुभव खुप श्रीमंत करून गेला.

अंदमानच्या हॅवलॉक आयलंडला भारतातील सर्वोत्तम बीचेस आहेत, तिथे स्कूबा डायविंग करता येते व जगातील सर्वोत्तम साईट्स पैकी काहि डाईव्ह साईटस आहेत हे कळल्यावर आमच्या सहलीत पूर्ण ६ दिवस त्या बेटावर काढण्याचे ठरवले होते. पोर्ट-ब्लेअरहून सकाळी एक व संध्याकाळी एक अश्या दोन फेरी बोटी त्या बेटावर जातात. अंदमानच्याही पूर्वेला दोन ते अडीच तासाचा प्रवास करून जेव्हा आपली फेरी या छोट्या बेटाच्या धक्क्याला लागते तेव्हाच स्वर्ग जवळ आहे याची चाहूल लागते. इथे असणार्‍या पाण्याचा रंग शब्दांत वर्णन करणे शक्य नाहि, यांत्रिक क्यामेराने आपला डोळा कितीही वाकवला-वटारला-झुकवला तरीही तो रंग त्यालाही टिपणे शक्य नाहि. तो हिरव्या-निळ्यासारख्या रंगाचा समुद्र आणि त्याला पांढर्‍याशुभ्र रंगाची किनार या नक्कीच अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.

इथे आमचे रिसॉर्टही अत्यंत मस्त जागी होते. आम्ही टेंटेड कबाना घेतले होते.आतून सुसज्ज व्यवस्था, टिव्ही सारख्या क्षुद्र गोष्टी नसलेले ते तंबु, बाहेर दोन आराम खूर्च्या, झोपाळा, खायची-प्यायची सोय, समोर पाचुचा बीच आणि सोबत बायको.. अजून काय पाहिजे बोला? ;) इथे पोचल्यावर स्वर्ग दोन बोटे उरला होता. पुढील आठवडा इथे काढणार ही कल्पनाच सुखावह होती. हा डायविंग रिसॉर्ट असल्याने भारतीय मंडळी मात्र कमी होती.

जग २/३ (~७१%) जग पाण्याने व्यापलेले आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो-शिकतो आहोत. याचा दुसरा अर्थ असा, की जरी आपण जगातील प्रत्येक भूभागात, देशात जाऊन आलो तरी फक्त १/३ पृथ्वीचा आपण आस्वाद घेऊ शकतो. बाकीचे २/३ जग हे आपल्यासाठी निषिद्ध आहे. म्हणजे खरं पाहता, २/३ भागात पाणी आहे म्हणजे तीच खरी पृथ्वी आहे. तेव्हा पृथ्वीच्या अंतरंगात शिरून तिचा आस्वाद घ्यायचा असे फार दिवस मनात होते. अमेरिकेत असताना चौकशी केली होती पण तिथे सर्टीफाईड स्कूबा डाईवर असणे गरजेचे होते आणि सर्टीफिकेशनची फी खूप जास्त होती.

मात्र आपल्याकडे भारतात स्कूबा डायविंगची मस्त सोय आहे. शिकण्याची फी (बाहेरदेशांपेक्षा स्वस्त असली तरी)थोडी जास्त आहे. मात्र मिळणारा अनुभव लक्षात घेता ही फी वसूलच नव्हे तर दामदुप्पट परतवा आहे असे समजायला हरकत नाहि. चार दिवसाचा कोर्स होता, ज्यात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व सहा डाईव्ह मिळणार होत्या. हनिमूनला जाऊन प्रशिक्षण घेणे जरी वेडगळ वाटत असले तरी बायकोने "सकाळचे ४च तास तर जायचंय, बाकीचा वेळ आहेच की आपल्यासाठी" असा समंजसपणा दाखवून केवळ पाठबळ दिलं नाहि तर स्वतःदेखील कोर्समधे सामिल होऊन सक्रिय पाठिंबाच दिला. :)

कोर्स सूरू होण्याच्या आदल्या दिवशी या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती वर्गात शिकवली गेली. विडीयो दाखवले गेले. आणि कोर्सचा पहिला दिवस उजाडला. आमच्या नावेत नावाडी सोडून मी, माझी बायको, एक फिनीश तरूण आणि एक जर्मन तरूण असे चार विद्यार्थी आणि एक टर्की आणि एक भारतीय प्रशिक्षक असे एकून ६ जण होते. आजपर्यंत जलतरण पूलमधे, नदीमधे, तलावात अगदी विहीरीतही केले आहे. खोल समुद्रात उडी मारण्याचा योग पहिलाच. पहिला दिवस विविध उपकरणांची ओळख, आपत्कालिन प्रसंगी करावयाच्या क्रियांची प्रॅक्टीस आणि सर्वात मुख्य म्हणजे पाण्याखालच्या संवाद साधण्याच्या खाणाखूणा यांचे प्रशिक्षण मिळाले. पहिल्या दिवशी छान सूर्यप्रकाश असल्याने पाण्यात आमच्याप्रमाणेच जेलीफीश देखील डुंबायला आले होते. त्यामुळे हात आणि पायावरच्या उघड्या भागांवर त्यांनी यथेच्छ चाऊन घेतले. :(

डायविंग चे तंत्र/उपकरणे याची ओळख वाचकांची इच्छा असल्यास वेगळ्या लेखात करून देईन. इथे उल्लेख करतो तो दोन अप्रतिम डाईव्हज् चा. पहिली डाईव्ह आहे "मार्स". एक बुडालेले जहाज. ह्या डाईव्हच्या आधी कोरल्स, मासे असणार्‍या पाण्याखालील सपाट पृष्ठभूमीवर गेलो होतो. त्याची धुंदी अजून ताजी होती. आणि आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला एका बुडालेल्या जहाजाजवळ डाइव्ह घ्यायचं सुचवलं आम्ही लगेच तयार झालो.

पाण्यात उडी मारली प्रशिक्षकाकडे तोंड करून त्याच्या खूणा समजाऊन घेत शास्त्रशुद्ध उतरंड (डिसेंट) चालू केली. वाढत्या खोलीनिशी कानावर येणारा दबाव, वाढत्या दबावाने रक्तात मिसळणारा नायट्रोजन आदिंची काळजी घेण्यासाठी प्रत्येक डाईव्हचा डिसेंट आणि असेंट (बुडणे आणि उभरणे) दोन्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे लागते. तर काहि मिनिटांनी आमच्या कंबरेचा खोलीमापक १६मी. दाखवू लागला. खाली जमिन दिसू लागली. जमिनीवर भरपूर रंगेबीरंगी कोरल्स आणि त्याभोवती बरेच मासे होते. इतक्यात प्रशिक्षकाने मागे पहा सांगितले. आम्ही वळलो मात्र दोन मिनीटे श्वास आपोआप रोखला गेला. समोरच उंचच्या उंच जहाज पाण्याखाली चिरविश्रांती घेत होते. इतक्या जवळ जहाज असेल याची कल्पना नसल्याने दोन मिनीटे खरंच श्वास घ्यायला विसरलो आणि त्यामुळे अजून खाली जाऊ लागलो :) (पाण्यास न पोहता केवळ श्वासावर पाण्यातील पातळी सांभाळावी लागते). नंतर सांभाळलो आणि मग त्या जहाजाची सैर करायला निघालो. एके काळचे चाच्यांचे जहाज, त्यांनी बोटीवर खरडलेली चित्रे तशीच्या तशी होती. त्याच बरोबर ते जहाज अनेकविध मासे आणि कोरल्सने पूर्ण भरलेले होते. इतरत्र न दिसलेले अनेक मासे इथे बघायला मिळाले. अचानक प्रकाश थरथरू लागला म्हणून वर पाहिले तर एक छोट्याशा माश्यांचा मोठ्ठा कळप प्रचंड वेगाने डोक्यावरून चालला होता. एकूणच वातावरण भयचकित आणि त्याच बरोबर विस्मयचकित करणारं होतं.

दूसरी एक डाईव्ह म्हणजे "द वॉल". इथे जायच्या आधीच आमचा प्रशिक्षक म्हणाला होता की तुम्ही आता जगातील सर्वोत्तम डाईव्हजपैकी एक आता करणार आहात. आणि ते खरंच होते. इथे साधारणतः ११ मीटरला एक सपाट जमिन होती ज्यावर नानाविध कोरल्स-मासे-शैवालाचे जंगल होतेच शिवाय सूर्यप्रकाश भरपूर होता. थोडे पुढे जाताच हे मैदान अचानक संपायचे आणि तिथे होती अजून ४० मीटर खोल सरळ उभी भिंत - द वॉल. ही इतकी खोल होती की इतक्या स्वच्छ सूर्पप्रकाशातही तळ दिसणे दूरापास्त होते. आपच्या उपकरणांची मर्यादा १८ मी होती. (यापेक्षा खोल डाईव्ह साठी जास्त हवेचे सिलेंडर, लांब हातांचे सूट, कानाला विषेश प्रोटेक्शन, नायट्रोजनच्या प्रादुर्भावापासून वाचण्याचे विषेश ट्रेनिंग लागते) त्यामूळे भिंतीच्या वरच्या ७ मीटरवरील जलचरसृष्टी पहता येणार होती. मात्र याच पट्ट्यात इतके बघितले की डोळ्यांचे पारणे फिटले. सप्तरंगांतीलच काय पण कोणत्याही रंगाच्या दूकानातील प्रत्येक रंगांपेक्षा वेगळे आणि नैसर्गिक रंगांचे थैमान डोळ्यापुढे होते. ब्रेन कोरल्स सारखे नजरवेधक प्रकार, श्वासोच्छवास करणारे कोरल्स, मासे खाणार्‍या वनस्पती, दगडांआड लपलेले ऑक्टोपस, काटे फेकणारे/फूगणारे मासे, घोडेमासे, स्टारफिश, इल, छोट्या माशांचे थवे, डोक्यावर मोठ्ठा टिळा लाऊन आपल्याच ऐटीत फिरणारा मोठ्ठा नेपोलियन वगैरे नानारंगी नानाढंगी माश्याचे संमेलन तिथे होते. ह्या पृथ्वीतलावरच्या ह्या निसर्गाच्या जिवंत चत्कारांपूढे मी नतमस्तक झालो. ह्या सहा दिवसात निसर्गाने आपल्या विश्वाचा चिमुकला हिस्सा माझ्यापुढे धरला होता. त्यामुळेच मी इतका भारावलो होतो.
(माझ्याकडे पाण्याखालचा कॅमेरा नसल्याने फोटो नाहि आहेत)

अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, ह्या हॅवलॉक गावाचे वैशिष्ट्य, की इथे प्लॅस्टिक बंदी आहे. बाटली हॉटेलात एकदाच देतात तीच नेहमी भरून देण्याची सोय आहे. अत्यंत साधी माणसे, छोटे बेट जगाला खूप मोठे काहितरी देत होते. बाकी डायविंग करायचे नसणार्‍यांसाठी स्नॉर्कलिंगची सोय आहे. याशिवाय देखील केवळ आराम करण्यासाठीही हे उत्तम स्थळ आहे. पूर्वकिनारा असल्याने उगवता चंद्र, रात्री एक वेगळेच विश्व निर्माण करतो. त्या चंदेरी लाटांवर डूलणार्‍या बोटी आणि शुभ्र वाळूमधल्या गप्पा अजूनही मनात रुंझी घालतात.

असो. तर "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव भारतातल्याच पण भारताच्या मुख्य भूमीपासून दूर असणार्‍या पोर्ट ब्लेअरलाच संपेल असा जो अंदाज होता त्याच्या साफ फडशा उडाला होता. सार्‍या भावनांच्या पलिकडचे सेल्युलर जेल, त्या पलिकडे असणारे जारवांचे जग - बारतांग बेट, मुख्य अंदमानच्या पलिकडचे हॅवलॉक, या पृथ्वीवर जमिनीपलिकडचे- पाण्याखालचे जग आणि लग्नापलिकडील नवेकोरे विश्व या सार्‍यांनी "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव एका समृद्ध अनुभवात परिवर्तित केली. कदाचित तिथे पुन्हा जाणे होणार नाहि, पण अलिकडच्या किनार्‍यावर बसून पलिकडील जंगलातल्या शिकारीच्या गोष्टी आठवून आठवून सांगणार्‍या आजोबांसारखे, त्या तिथले आठवणींचे कढ आयुष्यभर येत राहतील हे नक्की

समाप्त

टिपः
स्कूबा डायविंग ही शारिरिक व मानसिक परिक्षा पाहणारी क्रिडा आहे. योग्य आरोग्य नसताना/प्रशिक्षणाशिवाय/उपकरणांशिवाय/सोबतीशिवाय हा खेळ खेळणे जीवघेणे ठरू शकते





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...