कुठेतरी बाहेर मस्त भटकून यायचं असा विचार मनात आला आणि इंदोर ,मांडू च नाव पुढे आलं. बरेच दिवस मांडू मनात घोळत होतचं. भटक्या मित्र स्वप्निल नुकताच मध्य भारत धुंडाळून आला होता. माहितीसाठी फोन केला. त्याच्याकडून कळलं धार सुद्धा अफलातून आहे. नवीन एका स्थळाची भर पडली. मित्रमंडळींसोबत फिरण्याचा आनंद असतोच पण कधीतरी एकट्याने लांबच्या अपरिचित प्रवासाला निघणं आणि अनोळखी माणसं जोडणं यात वेगळा आनंद असतो. सारं काही एकला चलो असल्यामुळे सारी तयारी व्यवस्थित करावी लागली. प्रस्थानाचा दिवस उजाडला. इंदोर कडे कूच केलं . गाढ झोपेत इंदोर मध्ये प्रवेश कधी केला कळलं देखील नाही. खिडकीतून इंदोर ची झलक पाहता पाहता गंतव्य स्थानी उतरलो. थंडीने शरीर कुडकुडत होत. पुढील पंधरा मिनटात हॉस्टेल (वैकुंठ होम स्टे) वर पोहोचलो. तिथे पाहतो तर त्याचे मालक श्री. वैशंपायन मूळचे रत्नागिरीचे तब्बल शंभर वर्षांपूर्वी इथे स्थलांतरित झालेले. गेल्यागेल्या इंदोरच मराठीपण जाणवायला सुरुवात झाली. थोडावेळ आराम करत बाहेर पडलो थेट खर्जाना गणेशाच्या दर्शनासाठी. आय आय टी आणि आय आय एम या दोन्ही विख्यात शिक्षण संस्था असलेले हे एकमेव शहर. इंदोरचे रस्ते मात्र एकदम चकाचक कुठेही घाण नाही. सगळीकडे कचरा कुंड्या लावलेल्या आणि मुख्य म्हणजे नागरिक कचराकुंडीतच कचरा टाकतात. सकाळीच नगर परिषदेच्या गाड्या कचरा जमा करण्याचं काम अत्यंत शिस्तबद्ध करत होत्या. उगाच नाही इंदोर भारतातलं स्वच्छतेत प्रथम क्रमांकाचं शहर आहे. आणि आपली मुंबईतील उपनगरं. शेवटी सरकार सोबत नागरिकांची मानसिकता महत्त्वाची ठरते. असो .
पेशवेकालीन खजराना गणेशाच्या दर्शनाने इंदोर दर्शनाचा श्रीगणेशा केला. येथे अनेक प्राचीन मंदिरांचा समूह आहे, आता भूक लागली होती. छपन्न दुकानाकडे मोर्चा वळवला . एकटा असल्यामुळे सिटी बसचा आधार घेतला . छप्पन दुकान . इथे सारीच उदरभरणाची दुकानं . वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तेही खिशाला परवडणारे . गरमागरम इंदुरी पोहे व जिलेबी. खरंतर जिलेबी हा प्रकार पर्शियन आणि पोहे महाराष्ट्रातले. पण दोन्ही एकत्र चाखायला मजा येते. शेव आणि कांदा पेरलेले वेगळ्या चवीचे पोहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी जिलेबी. इंदोरी पोहे व जिलेबी पोटात ढकलत पोटपूजा केली. मजा आ गया .
इंदोरची शान असलेला होळकरांचा राजवाडा दुरुस्ती कारणामुळे बंद असल्यामुळे बाहेरूनच पहावा लागला. त्याची उणीव मात्र बाजूला असलेल्या वस्तू संग्रहालयाने भरून काढली. येथे होळकरांच्या बऱ्याच आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. मल्हार राव होळकर आणि अहिल्याबाईंचा इतिहास जिवंत होऊन डोळ्यासमोर उभा राहतो. अत्यंत साधे पण दूरदृष्टी असलेले शूरवीर मल्हार राव. अशा शूर मल्हार रावांविषयी राजस्थानी कवी म्हणतो
"अइयो बखत मल्हार का ,अइयो बखत अबीह ! गरजण लागा गडरी ,दर्पण लागा सीहं !!
सिंहा सिर नीचा किया गाडर करै गलार ! अधपतियाँ सिर ओधीणी ,तो सिरपर पाघ मल्हार!!
त्यानी अहिल्याबाईना सून करून घेतली. शंकराची निस्सीम भक्त असलेल्या या देवीने मध्ययुगातील रूढी झुगारत सासऱ्यांकडून राज्यकारभाराचे व युद्धाचं शिक्षण घेतलं. माळव्याच्या गादीवर बसली. सत्ता उपभोगायची म्हणून नव्हे तर सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी. त्यांच्या न्यायासाठी झटली . लोकोपयोगी कार्यासाठी त्यांनी अफाट मदत केली. त्यांच्या कार्याला सलाम करत बाहेर पडलो.
| हातमाग (अहिल्यादेवींनी महेश्वरी साड्या विशेष प्रोत्साहन ) |
बाहेर एक रिक्षा वाले काका भेटले. पाहताक्षणीच माझ्या कपाळावरचा टिळा पाहत "खजराना गणेश जाके आये क्या?" विचारलं . मी हो म्हटलं. बोलता बोलता कळलं ते मुंबईहून बऱ्याच वर्षांपूर्वी इंदोर ला स्थायिक झाले. आता मराठीतून बोलण्यास सुरुवात झाली. काका म्हणाले ,"बेटा मी तुला इंदोर फिरवतो." त्यांच्या बोलण्यात आणि डोळ्यात आपुलकी दिसली. लगेच हो म्हटलं इंदोरही फिरता येईल आणि गप्पाही होतील . लाल बाग महालात प्रवेश केला. येथे डोळे दिपून गेले. अत्यंत भव्य असा महाल. ऐषोआराम असलेला हा पॅलेस . मोठी डायनिंग टेबल्स . संगमरवराचे सुशोभित कलाकुसरीचे खांब. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा इथे बऱ्यापैकी दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी फ्रेंच शैलीची कलाकुसर. मोठे डान्सिंग हॉल्स. साराच श्रीमंती थाट. थोड्या वेळापूर्वी पाहिलेला मल्हार रावांचा अत्यंत साधा राजवाडा आणि या पॅलेस मधील ऐय्याशी. फरक नक्कीच जाणवतो. मल्हार रावांच्या वाड्याचं शौर्याचं वलय इथे नाही. यापुढचं ठिकाण अन्नपूर्णा मंदिर प्रवेशद्वार चार हत्तींच्या प्रतिकृतीवर तोललेलं. आत निराळं असं वेद मंदिर आहे. अथर्व , साम ,यजुर्वेद,ऋग्वेद. पुढे काका बडा गणपती मंदिरात घेऊन गेले. येथे गणेशाची भव्य अशी मूर्ती आहे. हे मंदिर पर्यटकांच आकर्षण आहे. आणखी एक आकर्षण म्हणजे शीश महल ( काच मंदिर). हे जैन मंदिर पूर्ण काचांनी मढवलेलं . भिंती, खांब, जमीन, आरसे सगळीकडे काचाच काचा. सजावटीसाठी सिरॅमिक टाईल्स बसवल्यात. काचेच्या मण्यांची महावीरांची मूर्ती आकर्षक वाटते. अनेक रंगी काचांनी मढवलेला हा महाल तोंडात बोटं घालायला लावतो. पुढे राजवाड्याच्या दिशेत टाउन हॉल आताचा महात्मा गांधी हॉल. इंडो गॉथिक शैलीत बांधलेला . सध्या कला,पुस्तक प्रदर्शनासाठी वापरला जातो. हे सार पाहता पाहता दुपारचे ३ वाजून गेले . काकांशी मनमोकळ्या गप्पाही सुरु होत्याच. मूळचे विदर्भातील असलेले काका मुंबईमार्गे इंदोर मध्ये आले त्याची कहाणी सांगितली. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते.
| लाल बाग पॅलेस |
| अन्नपूर्णा मंदिर |
![]() |
| शीश महल(google image ) |
सेंट्रल म्युझिअम कडे पोहोचलो . काकांचा निरोप घेतला. धन्यवाद देत पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं. धावत आत प्रवेश केला. गेल्यावर कळलं वेळ फार थोडा आहे. अत्यंत भव्य अस हे संग्रहालय खूप काही पाहण्यासारखं आहे. पण फारच थोडा वेळ हातात होता. आणि बरीच दालनं . पहिल्याच दालनात अशमयुगीन काळातील हत्यारं ,मोहंजोदाडो उत्खननात मिळालेले अवशेष तसेच ताम्र निधी कायथा संस्कृती ,ताम्रयुगीन पात्रवशेष पाहायला मिळतात. अश्मयुगीन काळात आदिमानव दगडी हत्यारांवर विशेष अवलंबून होता. त्याने लाकूड व प्राण्यांची हाडं याचाही वापर केला. हि उपकरण आदिमानवाच्या बौद्धिक विकासाचा परिचय करून देतात. तसेच आर्थिक व सांस्कृतिक जीवनावर प्रकाशझोत टाकतात. काळाच्या किंवा विकासाच्या ओघात हे सगळं नष्ट होत गेलं. मध्य प्रदेशात नद्यांच्या खोऱ्यात तसेच पर्वत रांगात मिळालेल्या या अवशेषांचं जतन केलं गेलंय. पुढील दालनात ऐतिहासिक शस्त्रास्त्र तलवारी, तोफा,बंदुका आदींचं दर्शन घडत. पुढच्या दालनात आपल्या भेटीस तऱ्हेतऱ्हेची नाणी येतात. यात उज्जयिनी मुद्रा, हिंदू - युनानी नाणी ,वल्लभी नाणी ,होळकरांच्या काळात पाडली गेलेली नाणी,तसेच मुसलमान राजांच्या काळातली नाणी पाहायला मिळतात. यात त्याकाळी इंदोर व भोपाळ राज्यसत्तेत सैनिकांना दिली जाणारी सन्मान पदक याचाही समावेश आहे. सारं गडबडीत पाहत शेवटच्या दालनात प्रवेश केला. नाना प्रकारच्या मूर्त्यांनी सजलेलं हे दालन. विशेष वेळ काढून पाहावं असं. येथे शिव, विष्णू,पार्वती, सरस्वती विविध रूपात पहायला मिळतात. लग्ना आधीची गौरी ,लग्नानंतरची पार्वती, आणि मुलं झाल्यावर उमा अशी रूपं . विष्णूचे दहा अवतार, परमार मूर्त्या याविषयी निश्चितच माहिती मिळते. हिंदू व जैन देवता पाहायला मिळतात. साधारण १२ व्या १३ व्या शतकातील हे अवशेष कलाकुसरीने थक्क करून टाकतात. तिथल्या मणी साहेबानी वेळ संपत आली होती तरी प्रत्येक मूर्तीच विश्लेषण केलं. यक्ष वराह वर कोरलेले ३३ कोटी देव, त्यातील समुद्र मंथन , वामनावतार असे बरेच प्रसंग सारं काही अदभूत . हे संग्रहालय इंदोर चा वैभवशाली इतिहास निश्चितच अधोरेखित करतं . पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावं असं .
दिवस संपत आला. पावलं निघाली छप्पन दुकानाकडे खादाडीसाठी . येथील आंबट गोड चटण्यांनी भरलेली कचोरी , बटला पॅटिस (भरलेले मटार) आणि वेडावणारे खोबऱ्याचे खास खोपरा पॅटीस . आता हे सगळं पोटात गेल्यावर गुलाबी थंडीत चहाची तल्लफ आलीच. चाय सुट्टा बार हे चहा प्रेमींच्या तल्लफीसाठी अगदी योग्य अस ठिकाण. वेगवेगळ्या स्वादात चहा. आलं, वेलची मसाला ते अगदी चॉकलेट, पान चहा सुद्धा तेही कुल्लड मधून.
![]() |
| खोपरा पॅटीस ,बटला पॅटिस , कचोरी |
रात्री पावलं सराफाकडे वळतात. सराफा बाजार हा वेगळाच प्रकार दिवसा सोनारांची दुकानं आणि रात्री खाण्याचे ठेले. जसजशी रात्र चढते तसा या सराफा बाजाराचा रंग आणि नूर बदलत जातो. खाद्यमय माहोल अगदी. जिलेबी, रबडी, गुलाब जामुन, दही वडे, गराडू अस बरच. काय खाऊ आणि काय नको अस होतं. येथे नियोजन कराव लागत नाहीतर पोट लगेच भरण्याची भीती. मी दही वडा सहसा खात नाही पण जोशींचा दही बडा अफलातून. गोड दह्यात बुडालेला वडा खाताना रसना तृप्त होऊन जाते. बुट्टे का किस मक्या चा आगळावेगळा पदार्थ. पाणीपुरी आता पाणीपुरीत वेगळ काय? तर इथे एक नाही तब्बल दहा स्वादाची पाणीपुरी मिळते. लसूण, पुदिना ,लिंबू वगैरे वगैरे. आणि समोर कितीही माणसं उभी असली तरीही पाणीपुरी वाला राऊंड मात्र चुकवत नाही. फारच गम्मत. अस सगळ खात पोटात थोडी फार जागा शिल्लक होती म्हणजे केली गेली. गोड शेवट शिकंजी नावाच्या पेयाने. श्रीखंड काजू, बदाम पिस्ता घालून केलेल . आता कुठे पोट भरल्यासारखं वाटलं. दोन्ही म्हणजेच छप्पन आणि सराफा येथे खिलवतात अदबीनं. आणि स्वच्छतेला महत्त्व दिल जात. खालेल्या पदार्थांची चव जिभेवर तशीच ठेवत सराफा चा निरोप घेतला. उदरभरण झाल्याने इंदोर भेट सार्थकी लागली. खादाडी साठी इंदूरला भेट द्यावीच एकदा तरी.
| सराफा बाजार |
![]() |
| शिकंजी |
सकाळी धार गाठायचं होतं . मध्य प्रदेश मधील सार्वजनिक वाहतुकीची पूर्वकल्पना असल्याने सकाळीच धार साठी गंगावल बस स्टॅन्ड गाठलं. धार साठी बस उभी होतीच. तीन चार वर्षांपूर्वीच्या रस्त्यात आणि आता बरीच सुधारणा वाटली. साधारण दोन तासात धार गाठलं. नाश्ता करत किल्ल्याकडे कूच केलं. धार बस स्टॅन्ड हुन पंधरा ते वीस मिनिटांचा पायी रस्ता. दुरूनच बलाढ्य असा धारचा किल्ला लक्ष वेधून घेत होता. जवळ येताच नजरबंदी करणारे भक्कम बुरुज . कमनीतून आत प्रवेश करत तटबंदीवरून निघालो. किल्ला निरखण्यास सुरुवात केली. खरबूजा महाल हि येथील वैशिष्ट पूर्ण ऐतिहासिक वास्तू . दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्म याच महालातील. आणखी एका वास्तूतील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. किल्ल्यात भोजकुवा हि भलीमोठी विहीर आहे. खाली उतरत पाहण्यास सुरुवात केली. आजूबाजूला झाडी वाढली आहे. धारच्या किल्ल्यातही पुरातत्व खात्याचं संग्रहालय आहे. उत्खननात मिळालेल्या १२ व्या १३ व्या शतकातील मूर्तीचं खूप मोठं दालन आहे. जैन गॅलरी वैष्णव गॅलरी अस वर्गीकरण. विष्णू,दिक्पाल देवी प्रतिमा,अर्धनारीश्वर ,ब्रम्हा ,पार्वती ,अंबिका नर्मदा, गणेश ,कुबेर,तीर्थंकर अशा सुरेख कलाकुसर असलेल्या दगडात कोरलेल्या मूर्त्या पाहताना डोळे विस्फारतात. बूढी मांडव ,बदनावर अशा ठिकाणी सापडलेल्या या मूर्त्या . येथे गद्धेगाळ पहायला मिळते. किल्ला पाहताना तीन तास कधीच गेले.
| धार किल्ला |
| Add caption |
| खरबुजा महाल |
पवार छत्र्यांकडे चालत निघालो. या छत्र्यांचा उल्लेख फारसा नाही. गुगल च्या नकाशावर सुद्धा नाही. विचारत विचारत शोधल्या. या पवार घराण्याच्या छत्र्या म्हणजे वास्तू कलेचा सुंदर असा नमुना. धार मध्ये पवार घराण्याची सत्ता होती. चार पाच छत्र्यांचा समूह हा सुखद धक्का होता. प्रत्येक छत्रीतील बारीक जाळीदार कलाकुसर केवळ पाहत राहण्यासारखी. याच डागडुजीच काम पाहून बरं वाटलं. अशा ऐतिहासिक वारश्याचं संवर्धन झालंच पाहिजे.
| पवार छत्री |
भोजशाळा मंदिर पाहण्यासाठी अकरा नंबरची पायगाडी सुरु केली. भोजशाळा हे भोज राजाने बांधलेलं सरस्वतीचं मंदिर. एक अप्रतिम विशाल अस वास्तुशिल्प . नक्षीदार खांबांवर तोललेलं सुरेख शिल्प.
| भोजशाळा मंदिर |
आणखी एक स्थळ खुणावत होत फडके म्युझिअम . गुगल मॅप ने गल्लीगल्लीतुन फिरवत बरोब्बर सोडलं. दुपार झाली होती. स्टुडिओ बंद होता. थोडा निराश झालो. एका भल्या माणसाने देव साहेबांचा फोन नंबर दिला. लगेच फोन केला त्यांच्याकडून कळलं कि स्टुडिओ जेवणाच्या सुट्टीसाठी बंद आहे. मुंबई हुन आलो सांगितल्यावर थांबा दहा मिनटात येतो असं सांगितलं. आणि संपूर्ण स्टुडिओ व्यवस्थित दाखवला. आणि फडके साहेबांचा जीवनपट उलगडला आणि कलाकृतींची माहितीही दिली. मूळचे वसई चे फडके साहेब त्यांच्या एक से बढकर एक कलाकृती पहाताना मन थक्क होतं. समाधानाने त्या महान कलाकाराला कुर्निसात करत स्टुडिओ बाहेर पडलो. देव साहेबांसोबत धार स्टॅन्ड वर आलो. धार ने खरंच मन जिंकलं होतं. खूप काही गवसलं होतं . आता मांडू नगरी साद घालत होती.
मांडूचं मायाजाल :पूर्वार्ध
घाट चढत आलमगीर,कमानी ,गाडी दरवाजातून बसने मांडू नगरीच्या मायाजालात प्रवेश केला. मालवा रिट्रीट या मध्य प्रदेश पर्यटनविभागाच्या डॉर्मेटरीमध्ये आधीच बुकिंग केलं होत. हे हॉटेल मोक्याच्या ठिकाणी वसलंय. येथून माळवा दरीचं दर्शन डोळ्यांना सुखावत. दोन ते तीन दिवस मांडू मुक्काम. मांडू, मांडवगड जणू एक किल्लाच. पश्चिमेकडील माळव्याचा भाग. सातपुड्याच्या रांगांनी वेढलेला . त्यामुळे नैसर्गिक संरक्षण लाभलेला. हिंदू व अफगाण वास्तुशैलीचा सुरेख मिलाफ. मांडू मध्ये काळाच्या ओघात अनेक सत्तांतर झाली. नवव्या शतकात मांडूवर परमारांचा प्रभाव होता. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी च्या ताब्यात गेलं. नंतर दिलावर खान घौरी शासक बनला. त्याच्या मृत्यूनंतर होशंगशहा सर्वेसर्व झाला. बाज बहादूर शाह, अकबर असे अनेक मुस्लिम राज्यकर्ते झाले. मुस्लिम अधिपत्याखाली येथे अफगाण शैलीत अनेक वास्तू उभ्या राहिल्या. मांडूत एकटे असाल आणि हे सारं फिरायचं असेल तर सायकल ला पर्याय नाही. शंभर रुपये प्रतिदिन भाड्याने मिळते. निवांत आणि स्व मर्जीने भटकता येतं हेही नसे थोडके. सायकल वर टांग मारत वारसा स्थळ मांडू नगरीचा पेटारा उघडण्यास सुरुवात केली. सुरुवात प्राचीन राम मंदिर दर्शनाने . थंडीची हुडहुडी होतीच. वाफाळलेले एम पी फेम पोहे व चहा थंडी उडवण्यास मदत करत होते. चहा पिताना "कैसे हो सर सायकल बराबर चल रही है ना ?" विस्मयाने पाहिलं तर म्हणाला "ये सायकल अपनी तो है" . आठवलं अरे हा तर कालचा सायकल वाला ज्याच्याकडून सायकल घेतली अंधारात चेहरा नीटसा दिसला नव्हता. पुढे म्हणाला "हमारा दिमाग कंप्युटर से भी तेज है, सब याद रहता है" मी म्हटलं "सायकल का लॉक ठीक से नहीं लगता कोई उठाके तो नहीं लेके जायेगा ? त्याच उत्तर "यहाँ मेरी साइकिल को सब पहचानते है कोई हाथ नहीं लगाएगा कोई जरुरत हो तो फ़ोन कर लेना"
| अश्रफी महल |
बाजूलाच असलेल्या अश्रफी महालाकडे मोर्चा वळवला. हा महाल दोन स्तरात आहे. होशंगशहा ने जामा मशिदीच्या समोर विद्यालय (मदरसा ) उभारले. येथे विद्यार्थ्यांसाठी उभारलेले कक्ष आजही दिसतात. सफेद संगमरवर आणि लाल दगडात सुंदर अस कोरीवकाम आढळतं. महमूद खिलजी ने राणा कुंभ च्या कोठडीतून सुटून आल्यावर सात मजली विजयस्तंभ उभारला ज्याची उंची संपूर्ण मांडूत जास्त होती. आज त्याचा काही भागच शिल्लक आहे. या महालविषयी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते स्थूल झालेल्या राण्यांचं वजन कमी करण्यासाठी सुलतान पायऱ्यांवर अश्रफी म्हणजेच नाणी ठेऊन गोळा करण्यास सांगत असे. इतिहासात शिरल्यावर अशा गोष्टी ऐकायला फार गंमत वाटते.
| अश्रफी महालातून दिसणारी जामी मस्जिद |
अश्रफी महालाच्या समोरच भव्य जामी मशीद आहे. आत प्रवेश करताच विशाल काय घुमटावर नजर केंद्रित होते. जामी म्हणजे महान. आत गेल्यावर महानतेची आणि भव्यतेची कल्पना येते. कोरीवकाम केलेल्या संगमरवरी खांबाची शृंखला ,जाळीदार नक्षीकाम केलेल्या खिडक्या,फुलांची सुरेख नक्षी सारं काही शाबूत . मशिदीची वास्तुकला पश्तून शैली च दर्शन घडवते. घुमटावरील नक्षीकाम अफलातून आहे. अनेक छोटे घुमट आहेत. भव्य असा प्रार्थना कक्ष. तब्बल आठ कमानींवर ,संगमरावर बारीक कोरीवकाम केलय. पश्चिम दिशेत असलेल्या भिंतीला सुंदर असा मिहराव आहे. जे हिंदू शैलीच प्रतीक आहे. या मशिदीची भव्यता पाहत असताना येथून पाय काही हलत नाहीत.
| जामी मशीद |
| सुबक कमानी |
| भव्य घुमट |
मशिदीच्या मागेच होशंगशहा चा मकबरा आहे. याला पाहताच ताजमहाल ची आठवण येते. संपूर्ण सफेद संगमरवरात बांधलेला. याची सुरुवात होशांग शाह ने केली आणि महमूद खिलजी च्या काळात बांधून पूर्ण झाला. वर विशाल घुमट आहे. चारी बाजूला मिनार आहेत. हा मकबरा अफगाण वास्तुकलेचा अजोड नमुना आहे. द्वारावर कोरलेली कमलपुष्प आणखीनच सुंदरता प्राप्त करून देतात. त्याच परिसरात पश्चिमेकडे हिंदू शैली दर्शवणारी धर्मशाळा आहे. येथे लाल दगडी खांबाची कलात्मक शृंखला मोहित करते.
| होशंग शहाचा मकबरा |
| हिंदू शैलीतील धर्मशाळा |
या जवळच्या वास्तू पाहत पुढे मार्गक्रमण केलं. मुख्य रस्त्यापासून थोडंसं आत महत्वपूर्ण वास्तू दारिया खान का मकबरा आहे. संगमरावर केलेली बारीक कलाकृती अद्भुत आहे. आत निळ्या रंगाच्या टाईल्स एक वेगळंचं रूप देतात. बाजूलाच दर्या खान ची मशीद आणि सोमवती कुंड आहे.
| दरिया खान का मकबरा |
| सोमवती कुंड |
हे सारं पाहून निघावं हत्ती महालाकडे. हाही हमरस्त्यापासून बऱ्यापैकी आतमध्ये. हत्तीसारखीच प्रचंड असणारी इस्लामिक आणि हिंदू कलेचं मिश्रण असलेली दगडातील ही वास्तू. याच्या चहूबाजूंनी तीन तीन कमानी आहेत. गोल घुमट अष्ट्कोनी बांधकामावर बांधला आहे. हा भलामोठा घुमट तोलण्यासाठीच खांबाचा आकार मोठा आहे. महालाच्या आत हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या व दरवाजे आहेत. सुस्थितीत असलेल्या महालाच्या स्थापत्य रचनेतील भव्यता व ऐतिहासिक महत्व आजही दिसून येतं .
| हत्ती महाल |
| मांडूतील सखी |
| लाल सराय |
थोडं पुढे गेल्यावर चार पाच वास्तूंचा समूह नजरेस पडतो. कारवा सराय मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी सामान ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी राहण्यास खोल्या अशी काहीशी मध्य युगीन युरोप शैलीतील याची रचना . समोरच मालिक मुगीस मशीद हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. यातल्या अंतर्गत सजावटीसाठी मोझॅक टाईल्स वापर केला आहे. मशिदीच्या पूर्वेस दोन वास्तू आढळतात. दाई का महल आणि दाई की छोटी बहन का महल. दाई म्हणजे नर्स लहान मुलांचं संगोपन करणारी. मोठा घुमट ,चहू बाजूनी दरवाजे आत फुलांची सुरेख नक्षी असा हा अष्टभुजाकार सुसज्ज असा महाल. आज त्यांचं स्मारक म्हणून ओळखलं जातं .
| सराय |
| मालिक मुगीस मशीद |
| दाई कि छोटी बहन का महल |
| दाई का महल |
सायकल सुसाट निघाली रेवा कुंड च्या दिशेत . डेरेदार झाडांचं आच्छादन आणि बाजूला पसरलेला सागर तलाव. भर दुपारीही थंडावा . वाटेत असलेला इको पॉईंट थोडं थांबण्यास प्रवृत्त करतो. हा अनुभव घेत पुढे निघावं. रस्त्याच्या उजवीकडे उंचावर जाली महाल लक्ष वेधतो .
| जाली महल |
मुस्लिम शैलीतील हे स्मारक. कमानी ,जाळी काम. इथून सागर तलाव व माळवा परिसर हा खूब सुरत नजारा दिसतो . पुन्हा मुख्य रस्त्यावर येत तडक रेवा कुंडाकडे . रेवा , परमार राजांच्या काळात बांधलेलं पाण्याचं कुंड . बाज बहादूर शाह ने त्याचा विस्तार केला . हे राणी रुपमतीचं आवडीचं ठिकाण होतं. आजही नर्मदा परिक्रमेत रेवा कुंडाला विशेष महत्त्व आहे.
| रेवा कुंड |
तिकीट घेत टेकडी च्या उतारावर वसलेल्या डोंगरांनी वेढलेल्या बाज बहादूर महालात शिरलो. तीन कमानदार दरवाजे पार करत आत प्रवेश केला. पहारेकऱ्यांसाठी येथे खोल्या आहेत. आतल्या दरवाजाने प्रवेश करताच प्रशस्त मोकळा भाग,चहुबाजूनी खोल्या व मध्ये कारंजे असा काहीसा माहोल. आतील सुरेख दालनं, तरण तलाव ,बाग त्यावेळच्या सुवर्ण काळाची साक्ष देतात. इथून एक जिना छतावर घेऊन जातो. छतावर सुरेख असे दोन बारदारी (घुमटाकार चबुतरा). महालाच्या वर असलेल्या चबुतऱ्यावरून मांडूचा सुंदर परिसर ,रूपमती महाल न्याहाळता येतो. कला आणि स्थापत्य यांचं सुरेख मिलाफ असलेला हा महाल नक्कीच मनात घर करून राहतो.
| बाज बहादूर शाह चा महाल |
| सज्जातून दिसणारा रूपमती महाल |
टेकडी चढत रूपमती महाल पाहण्यास सज्ज झालो. दुरूनच त्याच मोहक रूप आकर्षित करतं . राणी रूपमती अतिशय सुंदर होती आणि गायची देखील सुंदर. बाज बहादूर याच कारणामुळे तिच्या प्रेमात पडला.
राजा बाज बहादूर ने राणी रूपमती साठी या विशेष महालाची निर्मिती केली. याच्या खालचा भागात कमानदार खोल्यांचा समूह आहे.
अरुंद पायऱ्या प्रशस्त छतावर घेऊन जातात. छतावर दोन चबुतरे आहेत. हा महाल राणी रूपमती व राजा बाज बहादूर यांच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो. असं म्हणतात की राणी नर्मदेचं दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसे. आणि म्हणूनच महालाच्या वरच्या भागाचा वापर नर्मदेच्या दर्शनासाठी केला जायचा खास राणी रुपमतीसाठी.
| रूपमती महालातून बाज बहादूर महाल |
सज्जातून माळव्याचा आकर्षक असा परिसर डोळ्यांना समाधान देतो.
असं म्हणतात कि रूपमती येथूनच नर्मदेचं दर्शन घ्यायची. दिवस कलायला
थोडा अवधी बाकी. गार वारा सुटलाय. सज्जात बसून मांडूचा परिसर न्याहाळताना
बाज बहादूर आणि रूपमती यांची प्रेमकहाणी डोळ्यांसमोर तरळते . परतायची वेळ
झाली. रूपमती महाल उतरताना वाटेत मांडूची प्रसिद्ध गोरख चिंच विकत घेतली.
थंडीचे दिवस त्यात मांडू थंड हवेचे ठिकाण आणि दिवस मावळतीकडे निघालेला . एक
मस्त असं वातावरण अनुभवत सागर तलावाच्या काठाने निघालो. सागर तलावावर थोडा
वेळ बसण्याचा मोह झालाच. हा तलाव आणि परिसर पाहताना वाटतं निसर्गाने
मुक्तहस्ते आढेवेढे न घेता उधळण केली आहे. त्यात ही वारसा स्थळं म्हणजे
सोने पे सुहागा.
पुढचं ठिकाण छप्पन महाल. पूर्वीच्या काळी इथे पोस्ट ऑफिस होत असं म्हटलं जातं ,जे आजूबाजूच्या छप्पन गावांना सेवा पुरवायचं म्हणून छप्पन महाल असावं. आत घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांवर मांडू आणि धार परिसरात उत्खननात सापडलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. हि मंदिरं सुलतान मांडूत येण्या आधी होती. गणेश ,शेषशायी विष्णू , पार्वती, ब्रम्हा ,सरस्वती अशा १० व्या ११व्या १२ व्या शतकात मिळालेल्या मुर्ती आहेत. या महालाचं सुंदर संग्रहालयात रूपांतर केलंय. दुसऱ्या दालनात मांडूच लोकजीवन आदिवासी जीवन त्यांची खान पण संस्कृती ,वेशभूषा मनोरंजनाची साधनं हे सारं मॉडेलच्या रूपात अनुभवता येत.
| छप्पन महाल |
दिवसाची सांगता होत होती. कालचा सूर्यास्त चुकला होता . तडक सनसेट पॉईंट गाठला. माळव्याचं दूरवर पसरलेलं खोरं. मऊशार थंडी . प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या. पश्चिम क्षितिजावर लाली उठू लागली. सारं स्तब्ध. लक्ष त्या माळव्या पलीकडे जाणाऱ्या गोळ्या कडे. दिवसभरात केलेली मांडू भ्रमंती आठवत होतो. सूर्य पल्याड विसावला. अंधार पडू लागला. मांडूच्या चौकात चहा आणि इंदूरहून उशिरा आलेल्या सायकलिस्ट ग्रुप शी गप्पा ठोकत दिवसाची सांगता.
कसं जायचं ?
इंदोर हून जवळपास १०० किमी
स्वतःच वाहन असल्यास उत्तम.
थेट बस सेवा नाही. इंदोर (गंगावल बस स्टॅन्ड) ते धार
धार ते इंदोर जवळपास ४० किमी






No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.