राजतरंगिनी आणि निलमन पुराणातील आख्यानानुसार काश्मीर हे एक मोठे सरोवर
होते. कश्यप – ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेले निवासस्थान. परंतु
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या भौगोलिक परिवर्तनाचे कारण म्हणजे
खडियानगर व बारामुल्ला येथील पर्वतांच्या खचण्यामुळे पाणी निघायला मोकळा
मार्ग तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील स्वर्ग असणार्या काश्मीरची
उत्पत्ती इसवी सन पूर्व तिसर्या शतकात सापडते. काश्मीरमध्ये अशोकाव्दारे
बौध्द धर्माचा परिचय झाला. कनिष्काव्दारे त्याचा प्रसार करण्यात आला.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी काश्मीरवर हून लोकांचा ताबा झाला. इसवी सन 530
मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती. परंतु उज्जैनमधील सम्राटांचे पुन्हा वर्चस्व
सिध्द झाले. विक्रमादित्य घराण्याच्या अस्तानंतर काश्मीर खोर्याला स्वत:चे
शासक मिळाले. हिंदू आणि बौध्द संस्कृतीची सरमिसळ झाली. इसवी सन 697 ते 738
काळात प्रसिध्द हिंदू राजा ललितादित्य याचे पूर्वेकडील बंगालपर्यंत,
दक्षिणेकडील कोकणपर्यंत, वायव्यकडील तुर्कीस्तानपर्यंत आणि ईशान्यकडील
तिबेटपर्यंत अशा चोहोबाजूंकडे राज्याचा विस्तार झाला. राजा ललितादित्य हा
घरे बांधण्याकरीता फार प्रसिध्द होता.
तेराव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुस्लीमांचे काश्मीरमध्ये आगमन झाले.
इसवी सन 1440 -77 काळात झैनुल अबीहित तातारच्या हल्ल्यापूर्वी हिंदू राजा
सिंहदेव यांचे पलायन. नंतर चकांचे झैन-उल-अबेदिनचा मुलगा हैदरशहावर आक्रमण
झाले. त्यांचे राज्य कायम. इसवी सन 1586 मध्ये अकबराने काश्मीर जिंकले.
इसवी सन 1572 मध्ये मोगलांच्या हातातून अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दाली
यांच्याकडे काश्मीरची सत्ता गेली. या पठाणांचे सदुसष्ट वर्षापर्यंत
काश्मीरमध्ये राज्य होते. महाभारतात देखील जम्मूचे नाव नमूद आहे. हडप्पा
मधील वस्तू आणि अखनूर येथील मौर्य, कुशान व गुप्त कालखंडातील प्राचीन वस्तू
यांच्या नवीन शोधामुळे प्राचीन माहितीला नवीन दिशा मिळते. जम्मूचा प्रदेश
बावीस वेगळ्या छोट्या टेकड्यांमध्ये विभाजीत आहे. डोगरा राजा मालदेव याने
अनेक प्रांत काबीज केले. इसवी सन 1733 पासून इसवी सन 1782 पर्यंत राजा
रणजित देव यांची जम्मूवर सत्ता होती. त्याच्या कमजोर वंशजामुळे, महाराणा
रणजित सिंह यांनी हा प्रदेश पंजाबला जोडला. नंतर राजा गुलाबसिंगकडे
हस्तांतरण झाले. जुन्या डोगरा कुटुंबातील सर्वात लहान वंशज राजा गुलाबसिंग
याचे रणजितसिंहाच्या प्रशासकामध्ये प्रभाव होता. जम्मूचा प्रांत परत
हस्तांतरीत झाला. 1947 पर्यंत डोगरा शासनकर्ते होते. 26 ऑक्टोबर 1947 ला
महाराजा भारतीय सिंग (हरी सिंग) यांची संघराज्याच्या सामीलनाम्यावर
स्वाक्षरी होऊन जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र भारतात विलीन झाले.
जम्मू आणि काश्मीर राज्याचा 32 अंश 15’ व 37 अंश 5’ उत्तर अक्षांश आणि 72
अंश 35’ व 83 अंश 20’ पूर्व रेखांश यांच्या दरम्यान विस्तार.
भौगोलिकदृष्ट्या राज्याचे चार विभागात विभाजन. पहिला विभाग म्हणजे पर्वतीय व
नीम पर्वतीय पठार, कांदीपठार, दुसरा विभाग म्हणजे शिवलिक रांगांसहीत
टेकड्यांचा भाग, तिसरा विभाग म्हणजे काश्मीर मधील दरीचा पर्वत आणि
पिरपांचाल रांगा, चौथा विभाग म्हणजे लडाख व कारगिल प्रदेशातील तिबेटचा
मुलूख.
काश्मीर हे सुंदर डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात.
काश्मीरला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. लडाख सुध्दा लहान तिबेट
म्हणून ओळखले जाते. लडाखमध्ये बौध्द संस्कृती पहायला मिळते.
लडाखी भागातील लग्न विधी विशेष आकर्षक आहेत. खाटोक चेन्मो हे लग्न
विधीनृत्य फक्त कौटुंबिक समुदायासमोर केले जाते, कोम्पा त्सुम-त्साक हे
नृत्य तीन यशस्वी पदन्यासाचे आहे. या नृत्याच्या नावातच हे तीन पदन्यास
अनस्युत आहेत. जाब्रो हे नृत्य लडाखच्या पश्चिम भागात पहायला मिळते. चाम्स
हे नृत्य लामांचे आहे. चाब्स-स्क्यान त्सेस हे नृत्य भांड्यांच्या आधाराने
केले जाते. राल्दी त्सेस हे नृत्य तलवार नृत्य असते. अल्लेय यातो या
नृत्यात गाण्याचाही समावेश आहे.
पारंपरिक संगीतात खास अशा वाद्यांचा समावेश असतो. सुरना आणि दामन म्हणजे
शहनाई आणि ढोल. लडाखी बुध्दांचा संगीत उत्सव हा तिवेटियन संगीतासारखाच
असतो.
लडाखी हे भारत- तिबेटीयन संस्कृती पाळतात. मुखवट्यांचा उत्सव हा लोकप्रिय
उत्सव असतो, लडाखी अन्न हे तिवेटीयन अन्नाच्या जवळपासचेच असते.
उदाहरणार्थ, थुकपा, नुडल सुप, आणि त्साम्पा. लडाखी लोक आपल्या उत्सवांच्या
वेळी सोन्या-चांदीचे दागिने परिधान करतात.
बासोहली पेंटींग हे जम्मू आणि काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे. लाकडापासून
विविध वस्तू तयार केल्या जातात. लोकरापासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण
करतात. काश्मीरी शालीही प्रसिध्द आहेत. लाकडाच्या बाहुल्या, वुलनचे कोट,
कशिदा आणि सुंदर नक्षीकाम काश्मीरात केले जाते. विविध धातूंपासून दागिने
तयार करण्याची परंपराही काश्मीर परंपरा आहे. पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, हिरे
ठेवण्यासाठीच्या पेट्या, फोटो फ्रेम, नक्षीकाम, रंगोटी अशा अनेक बाबी
काश्मीरशी संबधीत आहेत.
चाकरी हे खूप लोकप्रिय असे पारंपरिक संगीत आहे. चाकरी हे गाणे आणि संगीत
असे मिश्र लोकसंगीत आहे. हार्मोनियम सारखे दिसणारे वाद्य, रूबाब, सारंगी,
नॉट, गेगर आणि चिमटा ही ती लोकवाद्य आहेत. या संगीतावर आधारीत लोककथा
सांगितल्या जातात. आणि लैला मजनू सारख्या पारंपरिक प्रेमकथाही सांगितल्या
जातात.
जम्मू आणि लडाखला सुध्दा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे
काश्मीर खोर्यातील प्रसिध्द नृत्य आहे. हे नृत्य पुरूषांकडून केले जाते.
महिला रूफ नावाचे दुसरे पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. कुड नावाचेही एक
लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे नृत्य लोकदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले
जाते. हे नृत्य एक विधी म्हणून केले जाते आणि ते फक्त रात्री सादर केले
जाते. बाछा नगमा नृत्य हे लग्न समारंभात केले जाते. शक्यतो हे नृत्य
तरूणांकडून सादर केले जाते. या नृत्यात सहा किंवा सात तरूण असतात आणि त्यात
एक गाणारा प्रमुख नेतृत्व करत असतो. याशिवाय दनदारा नृत्य, लाडीशहा नृत्य
आदी नृत्य प्रकारही काश्मीरात प्रसिध्द आहेत.
सुफियाना कलाम हे अभिजात संगीत काश्मीरचे समजले जाते. या संगीताचा स्वत:चा
असा राग आहे, ज्याचे नाव माकम असे आहे. संतूर वाद्यावर हे संगीत निर्माण
केले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल आणि डोकरा ही वाद्यही वाजवली
जातात.
हस्तव्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय. राज्यातील रोजगारांमध्ये सर्वात महत्वाचा
पर्याय म्हणून पारंपरिक व्यवसाय आहे. हस्तव्यवसायाला प्राधान्य. तसेच
देशात आणि परदेशात या हस्त व्यवसायातील उत्पादनांना मोठी मागणी असते. या
उत्पादनामध्ये पेपर- मशीन, लाकडी साधने, गालीचा, शाल, नक्षीकाम व इतर
साधनांचा समावेश आहे. या उद्योगांतून प्रामुख्याने गालीचाच्या उद्योगातून
भरमसाठी विदेशी चलनांची प्राप्ती होते.
सुमारे 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. धान, गहू व मका प्रमुख पिके
घेतली जातात. बार्ली, बाजरा व ज्वारीही पिकेही काही भागात घेतली जातात.
लडाख मध्ये हरभरा पिकतो.
रामाचा रावणावरील विजय- विजयादशमी – अस्सूज म्हणून साजरा केला जातो.
शिवरात्रीचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात होते. ईद-उल-फित्र, ईद-उल-झुला,
ईद-मिलाद-उल-नबी आणि मेहराज आलम हे प्रमुख मुस्लीम सण, मोहरम देखील
महत्वाचा. जून मध्ये साजरा होणारा लडाख मधील हेमिस गुंपा हा सण
विश्वविख्यात आहे. त्यातील मुखवट्यांचे नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य.
जानेवारीतील वार्षिक सणात कालिमातेच्या प्रचंड मूर्ती लेहमधील स्पिटुक मठात
प्रदर्शित केल्या जातात. हिवाळ्यात साजरा केला जाणारा ‘लोहरी’ रामबाग व
सभोवतालच्या खेड्यात साजरा केला जाणारा सिंहसंक्रांती भडेरवा व किस्तवार
येथे चैत्रात साजरा केला जाणारा ‘मेला पाट’ हे लोकप्रिय उत्सव आहेत. लोहरी
म्हणजेच मकर संक्रांत, बैसाखी, हेमीस, दसरा, दिवाली, बाहु मेला, उरूस, आदी
सण काश्मीरात साजरे केले जातात.
जम्मू व काश्मीर मध्ये उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोगरी, हिंदी, पहाडी,
बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी, दादरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात
असल्या तरी अजून काही लोकभाषा राज्यात बोलल्या जातात, त्या खालीलप्रमाणे:
भाषा – कोण बोलतं
बाल्टी - बाल्टी
चाँग्पा - चाँग्पा /चाम्पा
द्रोस्खत, (दोक्पा) - दोख्पा/ द्रोक्पा
गु्ज्जरी - बाकरवाल
लदाखी - बेडा, बोध, गारा, मोन
परीमु - गुज्जर
शिना - ब्रोक-पा
या व्यतिरिक्त बाकरवाल, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दर्द,
गड्डी, गारा, मोन, पुरीगपा, सीप्पी आदी आदिवासीही काश्मीरात निवास करतात.
अखनूर, अचबल, अथवट्टू, अनंतनाग, अमरनाथ, अवंतीपूर, अलची गोम्पा, कारगिल,
किश्तवार, कुड, कोकरनाग, खजियार ग्लेशियर, गुलमर्ग, जम्मू, तरसर व मरसर
सरोवर, दाचीगाम अस्वले, नहलगाम थंड हवेचे ठिकाण, पूरमंडल, बाटोट, मनसर
सरोवर, लायामारू बौध्द मठ, लेह, वुलर सरोवर, वेरीनाग सरोवर, वैष्णोदेवी,
सरसर, सियाचीन ग्लेसीयर, सोनमर्ग, श्रीनगर, हरवर, हेमीस उद्यान, डल सरोवर,
लडाख, शालीमार बाग, निशात बाग, नुबरा खोरे, बेताब खोरे, बहु किल्ला,
लोहचुंबक टेकड्या आदी पर्यटन केंद्रे महत्वाची आहेत.
काश्मीर राज्यात काराकोरम, कार, लडाख, पीरपांजाल, धौलाधार, शिवालिक हे
पर्वत असून सिंधू, श्योक, झेलम, चिनाब, रावी, रिहन्द ब्रिनघी, चिपच्याप,
दोडा, द्रास, गालवन, इंदूस, लिद्दर, मारखा, नाला पालखू, निलूम, नुब्रा,
पुंछ, रांबी, संद्राम, शिंगो, सिंद, सुरू, तावी, तसराप, उझ, वेशाव या नद्या
राज्यातून वाहतात.
(हा लेख महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या वेबसाइटवर ‘महाभ्रमंती’ या
विभागात ‘सांस्कृतिक भारत’ या माझ्या सदरात प्रकाशित झाला आहे. या
व्यतिरिक्त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर
अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. या लेखाचा इतरत्र वापर
करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,
प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
अगर फिरदौस बर्रूए-जमीनस्तो, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो। . जन्नत अगर कही है तो यही है, यही है, यही है।.
बहुधा जहांगीर म्हणाला किंवा कोणीतरी उर्दु शायर. ज्याने कोणी लिहिले आहे त्याने काश्मीरचे वर्णन करताना सत्यापासुन गुंजभरही फारकत घेतलेली नाही आहे. याहुन योग्य शब्दात काश्मीरचे वर्णन करता येणार नाही. जे डोळ्यांना दिसते ते कॅमेर्यात कैद होउ शकत नाही आणि शब्दात वर्णन करता येत नाही. तरीही हा एक तोकडा प्रयत्न काश्मीरची सैर घडवुन आणण्याचा. माझा टंकलेखनाचा वेग महान असल्यामुळे २-३ भागात प्रकाशित करेन.
पुण्यात तापमानाची स्पर्धा ४० च्या अंकाशी व्हायला लागली तसे थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीचे वेध लागले. काश्मीर नक्की केले तेव्हा मनात थोडी धाकधूक नक्की होती. पण दहशतवादाच्या भितीला योग्य ठिकाणी मारुन आम्ही तयारीला लागलो. जास्त 'रिक्स' घ्यायची नसल्यामुळे ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे निश्चित केले. ट्रॅव्हल कंपनीतर्फे जाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे आपल्याला काही करायला लागत नाही. सगळे त्यांच्यावर सोपवुन निवांत बसायचे. आणि अनेक तोट्यांपैकी एक म्हणजे प्रवासाची व्यवस्था काय असेल त्याचा भरवसा नसतो. आमच्या टुर ऑपरेटर ने आम्हाला गो एयर च्या हवाली केले. आईशप्पथ सांगतो गो एयर हा एक थ्रिलींग अनुभव असतो.
बोर्डिंग पास घेतानाच मी काउंटर वरच्या कोस्मेटिक कंपनीची जाहिरात करणार्या ललनेला किमान ३ विंडो सीटस द्यायला सांगितल्या. त्यावर तिने केवळ १ उपलब्ध असल्याचे सांगुन माझी बोळवण केली. तसे मला विंडो सीटचे फारसे आकर्षण नाही पण विमानातुन बर्फाचे डोंगर दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे मला खिडकी हवी होती. शेवटी १ खिडकीवर समाधान मानुन विमानात शिरलो. तर माझ्या जागेवर एक ललना आधीच बसलेली होती. माझ्या पुणेरी आवाजात कमाल मार्दव आणुन मी तिला ती माझ्या जागेवर बसल्याची जाणीव जरुन दिली. त्यावर च्यायला आजकाल कोणीही विमानात बसायला लागलय. साधे सीट नंबर्स बघता येत नाहीत असे भाव चेहेर्यावर आणुन तिने मला शांतपणे ति तिचीच सीट असल्याचे सांगितले. मग दोन्ही बोर्डिंग पास बघता असे लक्षात आले की सीट एक और आदमी दो अशी नाइन्साफी झालेली आहे. मी तेवढ्याच शांतपणे ही बाब हवाई सुंदरीच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर १५ मिनिटात ४ वेगवेगळ्या लोकांनी आमच्या दोघांचे बोर्डिंग पास चेक केले. माझा वेंधळेपणा लक्षात घेता मी चुकुन मुंबै - दिल्ली - श्रीनगर च्या ऐवजी कन्याकुमारीच्या विमानात नाही ना शिरलेलो याची मी स्वतः ३-४ वेळा खात्री करुन दिली. एव्हाना आजुबाजुच्या लोकांची छान करमणुक सुरु होती. मी सीटपाशीच (म्हणजे माझी असुन नसलेल्या सीटपापा) उभा असल्याने येणार्या जाणार्या लोकांना त्रास होत होता आणि काय गावंढळ माणूस आहे असे भाव नजरेत आणुन ते मला साइड द्यायला विनवीत होते. एव्हाना आजुबाजुच्या लोकांच्या "गो एयर मध्ये आणि एष्टी मध्ये फारसा फरक नाही", "काळजी करु नका ते तुम्हाला उद्याच्या फ्लाईट मध्ये जागा देतील " वगैरे कमेंट्स पास करुन झाल्या. दुसर्या दिवसाच्या विमानातुन जाण्याऐवजी मी मध्ये स्टुल टाकुन बसायलाही तयार होतो. अर्ध्या तिकिटात तसा मी उभा राहुनही गेलो असतो पण वरती हात धरायलाही विमानात जागा नसते त्यामुळे थोडा पिराब्लेम होता.
परत एक हवाई कन्या आली आणि "Sir is your seat number 21 Delta?" असे मंजुळ आवाजात विचारायला लागली. Delta? म्हणजे काय? माझा सीट नंबर तर 21 D होता. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला D म्हणजे Delta. त्या कन्येने शेवटी मला 1 Bravo वर बसायला सांगितले आणि कडकड केल्यावर 1 Alpha वर बसु दिले. Alpha, Delta, Bravo वगैरे शब्द ऐकुन मला एकदम डेल्टा फोर्स मधला सोल्जर झाल्यासारखे वाटायला लागले होते. गो एयर मध्ये जागा मिळणे हे असेही एक युद्धच होते म्हणा. अखेर एक सीट दोघांना दिल्याचा मला फायदाच झाला. पुढच्या तिन्ही सीटवर माझ्याशिवाय कोणीही बसलेले नव्हते.
थोड्याच वेळात खिडकीतुन दिसणारे ढगांचे पुंजके बघायचा मला कंटाळा आला. बाजुला नजर फिरवली तर वॉशरुमच्या बाजुने येउन एक इसम माझ्या शेजारी येउन बसला. पाठोपाठ दुसर्याने उरलेली एक सीटही बळकावली. हा काय प्रकार आहे हे मला झेपेना. भारतीय रेल्वेच्या शौचालयात लपून प्रवास करणारे महाभाग मला माहिती होते. पण विमानात पण हा प्रकार चालतो हे मला माहिती नव्हते. शेवटी गो एयर मध्ये काहीही होउ शकते हे मनात बिंबवुन मी गप्प बसलो. थोड्या वेळाने उलगडा झाला की ते लोक "रांगेत" होते. आतला माणूस बाहेर आला की माझ्या शेजारचा तुंबलेला माणूस आत घुसायचा. आता जास्त ताप व्हायला लागला. एवढी घाउक रांग मी याधी कुठल्याही फ्लाइट मध्ये नव्हती बघितली. माणसे यायची कसनुसा चेहेरा करुन बघायची. थोड्या वेळाने नंबर लागायचा. माझ्या बाजुच्या सीटा म्हणजे तुंबलेल्या लोकांसाठी वेटिंग रुमच झाली होती. थोड्या वेळाने एक ४- ५ वर्षाचा पोरगा येउन बसला. दोन मिनिटे त्याने वाट बघितली आणि अखेर म्हणाला "अंकल बहुत जोर की लगी है" मी ब्लँक झालो. काय बोलावे ते कळेना. जोर की लगी है म्हणजे? मी काय करावे अशी अपेक्षा आहे? मी काय सुलभ शौचालयाचा चालक, संचालक, संस्थापक आहे का? मी काय करु शकणार तुला घाईची लागली आहे तर? पण अखेर मुलावर दया येउन मी "रांगेत" उभ्या राहिलेल्या एका माणसाला पोराला पुढे जाउ द्यायची विनंती केली. त्याच्या चेहेर्यावर पोरं तुम्ही जन्माला घालणार त्रास आम्हाला होणार असले काहीसे भाव दिसले. पण हो म्हणाला बिचारा. पोर माझे नाही हे त्याला ओरडुन सांगावेसे वाटले. पण काय करणार? गप्प बसलो. हे म्हणजे खाया पिया कुछ् नही गिलास तोडा बाराना टाइप झाले. अखेर एकदाचे विमान दिल्लीला लँड झाले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझे भोग अजुन संपले नव्हते. दिल्ली - श्रीनगर सेक्टरला सेम ताप. परत माझी सीट दुसर्याला दिलेली. वर ती बाई ( म्हणजे हवाई बाई. तिला मी मागच्या सेक्टर वर पण हाच प्रकार झाल्याचे सांगितले) मला तोंडभरुन म्हणाली "you should have informed this to the ground staff" मग मात्र माझे डो़के सटकले. माझा पुणेरी बाणा दाखवत मी तिला विचारले "You mean to say that i should have assumed that Go Air ground staff is idiot enough to repeat the same mistake again?" (वाचताय ना मी किती फर्डे इंग्रजी फाडतो ते). अखेर परत अल्फा, ब्राव्हो, डेल्टा चा खेळ खेळत मी एकदाचा स्थानापन्न झालो.
तासाभरातच विमान श्रीनगरपाशी पोचले. आणि खिडकीबाहेर बघुन मी तृप्त झालो. कापूस पिंजुन ठेवावा तसे ढग आणि त्या ढगांआडुन डोकावणारी "स्नो व्हाइट " म्हणजे काय त्याची अनुभुती घडवणारी हिमशिखरे. फोटो न काढण्याची एयर होस्टेसच्या सुचनेला फाट्यावर मारुन कॅमेर्याचा क्लिकक्लिकाट सुरु झाला. जे दिसले जे अनुभवले ते याआधी अनेकांनी अनुभवले असेल. युरोप अमेरिका वारी करणार्या हाय फ्लायर्स साठी हा नजारा काही नवीन नसेल. पण माझी ही पहिलीचे वेळ होती.
गो एयर चा त्रास आणि तिकीटाचे पैसे वसूल झाले. हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी थी.
मिशन काश्मीर - २ (श्रीनगर)
श्रीनगरचा विमानतळ तिरुपतीच्या बस स्टॅण्ड पेक्षा फारसा वेगळा नाही. तसाच गोंधळ तसाच अस्ताव्यस्तपणा. बाहेर पडल्यावर मागे लागणारे तसेच रिक्षावाले / टॅक्सीवाले. हा दोन फरक आहेत. तिरुपतीसारखी डुकरे दिसली नाहीत. तशी ते पुर्ण काश्मीर मध्ये कुठेच दिसली नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान गाडीच्या टपावर टाकण्याचे तिरुपतीला कोणी ३० रुपये घेत नाही. ते सुद्धा तुम्ही कुठलीही मदत मागितली नसताना स्वतः मदत करुन. म्हणजे स्वतः होउन तुमच्या हातातुन सामान काढुन घ्यायचे. ते तुम्हीच टॅक्सीपर्यंत नेलेले असते. ते फक्त टपावर चढवायचे आणि मग खुषी मागायची. १० रुपयात कोणी खुष होतच नाही मग तुम्ही अजुन १० रुपये टेकवता तरी खुषी झालेली नसते. मग अजुन १० रुपये. तरी खुष नाही. मग तुम्ही नाद सोडुन देता. अजुन जास्त पैसे दिले असते तर त्या किमतीत एक बॅगच विकत घेता आली असती.
अखेर एकदाचे श्रीनगर शहराकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही १ मे ला गेलो होतो. त्या दिवशी श्रीनगर मध्ये चोर येतात असे आमचा टॅक्सी ड्रायवर म्हणाला. चोर म्हणजे आमदार / मंत्री गण. काश्मीरी लोकांच्या मते काश्मीर मध्ये ३ प्रकारचे चोर आहेत. काश्मिरी पोलिस. हे सगळ्यात साधे चोर कारण ते काश्मीरचे असतात. मग कश्मीर राजकारणी कारण ते हिंदुस्तानच्या इशार्यावर चालतात आणि सगळ्यात मोठे चोर मिलिटरीवाले कारण ते आम भोळ्या भाबड्या काश्मिरी जनतेवर अत्याचार करतात. तर आम्ही गेलो त्या दिवसापासुन या मधल्या फळीतल्या चोरांच्या कचेर्या श्रीनगरला हलणार होत्या. ६ थंडीचे महिने जम्मु काश्मीरची राजधानी जम्मु ला असते आणि ६ महिने उन्हाळ्यात श्रीनगरला. तसा काश्मीरला उन्हाळा नसतोच. तिथे थंडी असते आणि खुप थंडी असते. उन्हाळा नसतो. उन्हाळा फक्त जम्मुला. जम्मु म्हणजे काश्मीर नव्हे हा नविन शोध सुद्धा श्रीनगर मधलाच. हे म्हणजे विदर्भ/ मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र नाही असे म्हटल्यासारखे वाटेल. पण काश्मीरी माणसाच्या मते हे असेच आहे. काश्मिरी माणसांची अशी बरीच मते असतात जी आपल्याला विचित्र वाटतात पण ती विचित्र आहेत असे म्हणायचे नाही हे दुसरे सुत्र. काश्मिरी माणसाचा आणि दहशतवादाचा काही संबंध नाही हे मनात सारखे घोळवत राहायचे हे तिसरे सुत्र. कश्मिरी जनतेवर सगळ्यात मोठे चोर खुप अत्याचार करत असतात असा समज करुन घेणे हे चौथे सुत्र आणि आपण हिंदुस्तानी आणि ते काश्मिरी हे समजुन घेणे हे पाचवे सुत्र. ही पंचसुत्री लक्षात ठेवली की तुम्हा काश्मिर मध्ये निवांत फिरु शकता. काही त्रास नाही. कारण तुम्ही ही पंचसुत्री लक्षात ठेवलीत तर दहशतवादी 'हिंदुस्तानी पर्यटकांना' काहीही त्रास देत नाहीत.
बॅक टु श्रीनगर. मधल्या फळीतले चोर येत असल्यामुळे मुख्य रस्ते बंद होते त्यामुळे आमच्या गाडीवानाने आम्हाला कच्च्या रस्त्यावरुन नेले. आम्ही जीव मुठीत धरुन बसलो होतो. हा नक्की हाउस बोटीत नेतोय की आपल्याला दहशतवाद्यांच्या हवाली करतोय या भितीने. पण गडी खासा बोलका होता. जाताना रस्त्याने चिनार - देवदाराची झाडी दाखवत होता. काश्मिरचे डुज आणि डोण्ट्स आम्हाला समजावुन सांगत होता. काश्मिरी लोक कसे अमनप्रेमी आहेत हे आम्हाला समजावुन सांगत होता. मध्येच एकदा त्याने आतंकवादी बघायचे का म्हणुन विचारले? आम्ही हो म्हणावे की नाही या संभ्रमात पडलो . आधीच हा आपल्याला आडबाजुने अतिरेक्यांकडे नेतो आहे ही भिती होती. आता तर उघडउघड विचारत होता. आम्ही शांत बसणे पसंत केले. अखेर त्यालाच राहवेना. त्याने आपणहुन रस्त्याच्या कडेने एके ४७ घेउन उभे असलेले २ दहशतवादी दाखवले. दोघे मिलीटरीवाले होते. मिलीटरीवालेच खरे दहशतवादी हे आम्हाला पहिल्याच दिवशी मिळालेले ग्यान. त्यानंतर मिलीटरीने काश्मीरची कशी वाट लावली आहे याबद्दल ५ मिनिटांचे एक आख्यान झाले. ही काश्मीरची एकुणच खासियत. कुठलाही काश्मिरी ड्रायवर दोन गोष्टी नक्की विचारणार / ऐकवणार. पहिला प्रश्न विचारणार की काश्मिर आवडले का? आणि दुसरे भाषण देणार की काश्मीर कसे सेफ आहे, 'हिंदुस्तानी मिडीया' कसा अपप्रचार करते, कश्मिरी माणूस कसा अमनप्रेमी आहे वगैरे. इथे आपण हे फक्त ऐकुन घेणे अपेक्षित असते. यावर प्रश्न विचारणे किंवा प्रत्युत्तर देणे अपेक्षित नाही हे समजुन घ्यावे. हा अनुभव नंतर वेळोवेळी आला. एरवी काही त्रास नाही.
बाकी कश्मिरी माणसाची भाषा समजणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे काम असते. तसे आपल्याला तमिळ, तेलुग, तुळु पण समजत नाही. पण तमिळ, तेलुग, तुळु ऐकताना ही भाषा ओळखीची आहे असेही वाटत नसते. काश्मिरी ऐकताना तसे वाटत राहते. म्हणजे फक्त वाटत राहते. समजत काहीच नाही. कारण काश्मिरी माणसाची भाषा हल्दीरामच्या नवरतन फरसाणासारखी असते. त्यात कश्मिरी , डोगरी, अरबी, पश्तुन, फारसी, हिंदी, उर्दु, पंजाबी अश्या अनेक भाषांचे मिक्स्चर असते आणि त्याला कश्मिरी माणसाच्या अजब हेलाची फोडणी असते. काही कळलेच तर तो केवळ योगायोग समजावा. या भाषांव्यतिरिक्त काही कश्मिरी दुकानदार इंग्रजांपेक्षा फाडफाड शुद्ध इंग्रजी बोलतात. आणि या सगळ्या फरसाणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही कधीमधी मराठी आणि गुजराथी शब्दही ऐकु शकता खासकौन मराठी. कश्मीरला भेट देणारे ७०% पर्यटक महाराष्ट्रीयन असतात. त्यामुळे कश्मिरी लोकांनी "थांबा, स्वस्त आहे, कमी नाही, इकडे या, तिकडे नको, छान आहे" वगैरे शब्द शिकुन घेतले आहेत.
कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली. अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली. तेव्हा पर्यटकांच्या गाडीच्या मागे पुढे मिलीटरीच्या गाड्या असायच्या. त्याच सुमारास माझे आज्जी आजोबा अमरनाथच्या यात्रेला गेले होते. दरड कोसळल्यामुळे ते रस्त्यातच अडकले. त्यावेळेस मिलीटरीनेच तंबु ठोकुन त्यांची राहण्याची व्यवस्था करुन दिली. रात्री मध्येच कधीही धडामधूड आवाज यायचे. लोक घाबरुन बाहेर आले की सोल्जर्स शांतपणे त्यांना सांगायचे. चिंता मत करो. कुछ खास नही छोटाही बम था. हम है ना. आप टेंशन मत लो. त्यावेळेस त्या लोकांना खरेखुरे आतंकवादीही दिसले होते. शांतपणे चहा पिउन, एके ४७ लपवत निघुन गेले होते. आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही (काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.)
दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे. अर्थात तिथल्या हवामानाइतका नाही. श्रीनगर मध्ये हवामान एकदम सुखकारक होते. हाउस बोटीत तर आसपास पाणी असल्यामुळे अजुनच थंड वाटते. हा हाउस बोट एक भन्नाट प्रकार असतो. २५ किमी मध्ये पसरलेल्या दल लेक मध्ये साधारण १२०० हाउसबोटी आहेत आणि जवळच्याच नगिना लेक मध्ये साधारण ८००. दोन्ही मिळुन श्रीनगर मध्ये २००० हाउस बोटी झाल्या. पटत नाही? हे बघा:
हाउसबोटीची अंतर्गत सजावट दृष्ट लागावी इतकी सुंदर असते. मोठी मोठी झुंबरं, उंची गालिचे, भारी लाकडी फर्निचर आपल्याला एकदम राजेशाही वातावरणाची अनुभूती देते.
एक साधारण हाउसबोट बांधण्यासाठी १-२ वर्षे लागतात आणि फार नाही पण साधारण १ खोका खर्ची पडतो. आतल्या सजावटीचा आणि मेंटेनन्सचा खर्च वेगळा. एका हाउसबोट मध्ये २ ते ५ शयनगृहे, छोटेसे स्वयंपाकघर, डायनिंग हॉल आणि दिवाणखाना असतो. पाण्यात उभ्या असणार्या हा महालांच्या आतमध्ये मात्र पाणी वापरायला सक्त मनाई असते. लाकूड खराब होउ नये म्हणुन. त्यामुळे कपडे धुवायचे नाहीत, आंघोळ करायची तर बाथ टब मध्ये बसुन, धुवायचे असेल तर...... जाऊ देत ते तुम्ही तिथे जाल तेव्हा तुम्हाला कळेलच. शिवाय फर्निशिंगला बरेच दिवस पाणी लागत नाही. बाहेर जायचे असेल तर शिकार्यात बसा आणि बाहेर पडा. काश्मिरी माणसासाठी हे सगळे खुपच सोप्पे आहे. तिथे लहान लहान मुले पाठीवर द्प्तर घेउन होडी वल्हवत किनार्यावर पोचुन शाळेत जाताना दिसली. आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळे पाण्यावरच्या महालात आपण १-२ दिवसांपेक्षा जास्त राहु शकत नाही. एरवी ही हाउसबोटींची इकोनोमी मोठी आहे. पाण्यावर तिकडे आख्खा बाजार तरंगतो. संध्याकाळी शिकार्यावर बसवुन एखादा शिकारेवाला तुम्हाला दल लेकची सफर घडवुन आणेल तर दुसर्या दिवशी तोच शिकारेवाला सकाळी होडीतुन तुम्हाला ताजी ताजी फुले आणि बिया विकताना दिसेलः
दल लेक मधला गाळ उपसुन त्याचाच खत म्हणुन वापर करुन त्यावर फुलं आणि भाज्या पिकवुन त्या पण विकताना दिसेलः
माझी खुप इच्छा होती की काश्मीर की कली सारखी एखादी शर्मिला गालावर गोड खळ्या पाडत आपल्याला फुले विकायला येइल, मग मी तिच्याकडुन सगळीच्या सगळी फुले विकत घेइन. मग ती दुसर्या दिवशी परत येइल. पण मी शम्मी कपूर नसल्यामु़ळे, माझ्या मालकीच कश्मीरमध्ये हाउसबोट किंवा बंगलाच काय साधा शिकाराही नसल्यामुळे आणि आख्ख्या शिकार्यामधली फुले घेण्याची माझी ऐपत नसल्यामुळे मला फुले विकणारे केवळ बाप्येच दिसले.
बाकी या दल लेकच्या तरंगत्या बाजारात तुम्हाला पुण्याच्या लक्ष्मी रोडवर मिळणारी हर एक वस्तु मिळु शकेल. किराणा दुकानापासुन, गालिचे आणि शालींपर्यंत सगळे मिळेल. सुकामेव्यापासुन काहवा पर्यंत सगळे मिळेल. न्हाव्यापासुन गॅस सिलेंडरपर्यंत सगळे मिळेल. तुम्हीच बघा म्हणजे झाले:
बाकी हे दल लेक हे सुद्धा एक अजब रसायन आहे. याच्या पाण्याचे स्त्रोतही अनेक आहेत. अंतर्गत झर्यांचे पाणी आहे तसेच झेलमचे पाणीही आहे. पावसाने वाढ होते तशी मुघल गार्डन्स मधले वाहते झरे सुद्धा येथे येउन मिळतात. एकेकाळी हे तळे प्रदुषणमुक्त होते. आज वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रदुषणामुळे दल लेकचे पाणी आपण तोंड धुण्यासाठी किंवा चुळा भरण्यासाठी पण नाही वापरु शकत. दल लेक जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक तळ्यांपैकी एक आहे. अर्थात याहुन मोठी बरीच तळी आहेत. आपण भुगोलाच्या पुस्तकात वाचले आहे ते. पण तरीही २५ किमीचा परिसर एका तळ्यासाठी अवाढव्यच म्हणायचा. १२ व्या शतकात तर हे तळे ७५ किमीमध्ये पसरले होते म्हणतात. आजही या तळ्यावर लाखाहुन जास्त लोकांची गुजराण होते. आपल्याकडे जशी जमिनीची मालकी आहे तशी कश्मिरी माणसाची दल लेकवरच्या पाण्यावर मालकी आहे. तो त्या पाण्याचा मालक. तिथे त्याने त्याचा शिकारा बांधावा अथवा हाउसबोट. दल लेक मधल्या हाउसबोटीवर बसुन सकाळच्या उगवत्या सुर्याला वंदन करणे आणि सायंकाळच्या मावळत्या सुर्याला टाटा करणे हे दोन्ही सुखावह आहे हे नक्की.
चला आज जरा जास्तच लिखाण झाले. आता मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर अगेन अजुन १-२ दिवसात.
फक्त एक विचारतोयः-
कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची
पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि
दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत
काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली.
खरय. खरं तर मागील दोन दशके, त्यातही मक्बूल भटला फाशी दिल्यापासुन आणि
करणसिंगांना(राजा हरीसिंग ह्यांचे चिरंजीव) राज्यपाल केल्यापासुन काश्मीर
प्रश्न भडकतच चाललेला आहे.
अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले.
म्हणजे अखेर पर्यटकांवरचेच हल्ले थांबले.
त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली.
महत्वाचं पाउल.
. आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट
अॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब
फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही
केवळ सात दिवसावरुन "आता" तसं नाही असं म्हणणं धाडसाचं वाटत.
कुठल्याही दहशतवादी कार्यात, सरकार विरोधी लढ्यात, क्रांतिकार्यात,
बंडामध्ये अधुन मधुन एक dormanted phase येतच असते. त्या अवधीत दोन्ही बाजु
आपापल्या तयारीला लागुन पुढल्या लढाइला तयार होतात. युद्ध संपलेलं नसतं.
सात दिवसात काहीच झालं नाही म्हणण्यापेक्षा,सात दिवसात तुमच्या पाहण्यात काहीच आलं नाही, असं म्हणणं योग्य ठरेल.
आपण एक अल्पकालीन पर्यटक असल्यानं आख्ख्या राज्याच्या स्थितीचं दर्शन होणं
आपणास शक्यही नाही आणि अपेक्षितही नाही. काश्मीर वर इथे मिपावरच शेकडो
प्रतिसाद देणारे धागे आणि त्यातले काही दीर्घांकी प्रतिक्रिया वाचल्यात तर
बरं होइल. काश्मीरचा घोटाळा पहिल्यापेक्षा कैकपट किचकट झालाय सध्या.
(काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.)
तेच म्हणतोय. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं.
त्यातही सरकार सोयीस्कररित्या हल्ली प्रसारमाध्यमं काबुत ठेवत असल्यानं,
तिथला जाळ्,तिथली धग आता साअमान्य भारतीयापर्यंत पोचत नाही असही म्हटलं
जातय. धग आहे तिथच आहे, गुंता तसाच आहे.
दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे.
सहमत नाही.
आपण गेलात हे उत्तम.
लेख मस्त जमलाय.
--मनोबा.
एक कोटी तर एका आयुष्यात ब्रेक इव्हन व्हायचे नाहीत... विचारच करता येत नाहीये. कोण करेल असा खर्च? नवीन कोणी बनवतच नसेल. मला वाटते पूर्वीच्या हाऊसबोटीच केवळ तग धरून राहिल्या असतील..
हाउस बोट बांधायचा खर्च जरा जास्त वाटतो खरे. पण तो तेवढा आहे हे २-३ जणांनी सांगितले. आमच्या हाउसबोटचा मालकही म्हणत होता म्हणजे खरेच असेल. अंतर्गत सजावाटीसाठीही बराच खर्च येत असावा.
एका बोटीचे आयुष्य साधारण २५-३० वर्षे असते. त्यानंतर अर्थात पाण्यात राहुन राहुन लाकुड कुजत असणार. म्हणजे अगदीच लाकडाची आहुती नसेल द्यायला लागत. पण डागडुजीची गरज असणार.
हाउसबोटीचे भाडे हॉटेल पेक्षा कमीच होते. साधारण ३ ते ४ हजारात चांगल्या हाउसबोटीत खोली मिळु शकते. काही हाउसबोटीत ८ हजारापर्यंत टॅरिफ आहे. हा उद्योग परवडणारा आहे की नाही ते नाही माहिती. पण ज्या संख्येने हाउसबोटी आहेत ते बघता परवडत असावा. रुम टॅरिफ वगळता हाउस बोटीच्या माध्यमातुन उत्पन्नाचा काही स्त्रोत वाटला नाही. बहुतेक सगळ्या हाउसबोटीतुन केवळ राहण्याची सोय होते. खाण्यापिण्याची नाही. सोय असेल तरी तिथे खाण्याचे लोक टाळतात कारण अन्न जर दल लेकच्या पाण्यात शिजवले असेल तर भगवान मालिक. पाण्याला खुपच वाईट वास असतो.
साधारण विचार करता हाउस बोटीतुन वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळाले तरच तो फायद्याचा व्यवसाय ठरावा. ३ ते ४ हजार रुपये रोजी भाडे लक्षात घेता आणि साधारण ३ शयनगृहे गृहीत धरुन एका दिवसाचे उत्पन्न ९ ते १२ हजार रुपये होते. म्हणजे महिना किमान १० ते १२ दिवस तरी हाउस बोट पुर्ण ओक्युपाय झाली पाहिजे. हे गणित जुळते की नाही ते माहित नाही. पण बहुधा अशक्यही नसावे. शिवाय ज्या हाउसबोटी जुन्या आहेत त्यांचा ब्रेक एव्हन झाला असेल तर फारसे अवघड नसावे.
काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली. आज कडव्या धर्मांधांच्या तडाख्यातुन त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिली आहेत. शंकराचार्य मंदिर हे त्यातीलच एक.
शंकराचार्य मंदिर म्हणजे आदि शंकाराचार्यांचे मंदिर असा बर्याच जणांचा समज आहे. तसे नाही आहे. हे शंकराचे मंदिर आहे. शंकराचार्य मंदिर भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असावे. असे म्हणतात इसवीसनापुर्वी २५०० वर्षे हे मंदिर बांधले गेले आणि वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार झाला. एक आख्यायिका अशीही आहे की भीमाने हे मंदिर बांधले. काही लोकांच्या मते हे मंदिर इसवीसनापुर्वी ५०० वर्षे बांधले गेले. खरेखोटे तो शंभुनाथ जाणे. पुर्वी हे मंदिर ज्येष्ठेष्वराचे मंदिर म्हणुन प्रसिद्ध होते. नंतर आदि शंकराचार्यांनी इथेच तपस्या केली आणि त्यांना शंकराने दृष्टांत दिला म्हणुन हे मंदिर शंकराचार्य मंदिर म्हणुन प्रसिद्ध झाले.
शंकराचे मूळ लिंग आणि आजूबाजूच्या ३०० हुन आधिक देवी देवतांच्या मुर्ती एका धर्मांध मुस्लिम शासकाने १४ व्या शतकात ध्वस्त केले. १५ व्या शतकात दुसर्या एका मुस्लिम शासकाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काश्मीरात हिंदु जनतेचे आणि मुस्लिम शासकांचे हे असे विळ्या भोपळ्याचे सख्य होते. एक यायचा जिझीया लादायचा, पंडितांना हाकलुन द्यायचा, मंदिरे फोडायचा, दुसरा यायचा पंडितांना अभय द्यायचा, मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा. अर्थात झैन उल अबिदीनसारखे सहिष्णु मुस्लिम शासक थोडेच होते.
मंदिर प्रसन्न आहे यात काही वाद नाही. यात आजुबाजुच्या वातावरणाचा जबरदस्त हातभार लागतो. समोर पसरलेले दल लेक, झुळ्झुळ वाहणारी झेलम, तळ्यात फिरणारे शिकारे, चहुबाजुला पसरलेले रम्य श्रीनगर आणि या सर्वांना खेळवणारा बारोमाही थंड वारा. मंदिर प्रसन्न वाटलेच पाहिजे. मुर्तीत देव असतो की नाही हा प्रश्न इथे पडणारच नाही. असाही मुर्तीत देव असो किंवा नसो मनात श्रद्धा असले म्हणजे कर आपोआप जुळतात. मंदिराच्या आवारातच शंकराचार्यांनी जिथे तपस्या केली ती गुहा देखील आहे. मंदिराच्या २८० पायर्या चढण्याची इच्छा आणि सामर्थ्य असेल तर इथे एकदा जरुर यावे. देवावर श्रद्धा नसेल तर निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी यावे.
शंकराचार्य मंदिराबाबत अजुन एक आख्यायिका आहे की या मंदिराला येशुनेही भेट दिली आहे आणि बुद्धानेही. बौद्ध धर्मीयांसाठीही हे मंदिर पवित्र आहे. ख्रिश्चनांचा एक गट आणि काही मुस्लिम असे मानतात की येशु क्रुसावर चढलाच नाही. तो तिथुन निसटला, ३ दिवसांनी प्रकटला आणि मग अफगाणिस्थान मार्गे काश्मीर मध्ये पोचला. त्यावेळेस त्याने म्हणे शंकराचार्य मंदिराला भेट दिली. याहीबाबतीत खरे खोटे तो शंभुनाथ जाणे. एकुण हे मंदिर अनेक शतकांच्या प्रहाराला समर्थपणे तोंड देउन उभी असलेली एक खरीखुरी आख्यायिका आहे :)
शंकराचार्याच्या मंदिराप्रमाणेच काश्मीरमधली दुसरी खरीखुरी आख्यायिका म्हणजे हजरतबल दर्गा. शंकराचार्य आणि हजरतबल हे कॉम्बिनेशन मनात पक्के झाले ते ह्रितिक रोशन च्या मिशन काश्मीर मुळे. यात अतिरेकी ही दोन्ही पवित्र स्थळे एकाचवेळी उडवुन हाहाकार माजवण्याच्या प्रयत्नात असतात. प्रत्यक्षात हे इतके सोप्पे आहे असे वाटत नाही कारण दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे.
हजरतबलाचे महात्म्य हे की इथे साक्षात प्रेषित मोहम्मदाचा एक केस ठेवण्यात आला आहे. मोहम्मदाचे एक अनुयायी मदिना सोडुन भारतात वास्तव्यास आले. नंतर त्यांच्या वंशजांनी हा केस ख्वाजा नुर उद्दिन ला चक्क विकला. त्याच ख्वाज्याच्या बायकोने नंतर हा दर्गा बांधला आणि इथे मोहम्मदाचा केस जतन करुन ठेवला. हा केस विकल्याबद्दल मूळ मालकाला आणि विकत घेतल्याबद्दल ख्वाजाला औरंगजेबाने चक्क कैदेत टाकले होते. इतका मुल्यवान तो केस अर्थातच कडेकोट बंदोबस्तात ठेवला होता. पण त्यातुनही तो कोणीतरी चोरला आणि आख्खे काश्मीर पेटले. नंतर ३ दिवसांनी तो केस परत मिळाला आणि काश्मीर पुर्ववत झाले. हजरत मोहम्मदांचीच कृपा म्हणायचीं. तो केस मूळ केसच आहे हे कसे ठरवले हा प्रश्न मी मनातच ठेवला.
दर्ग्याच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त आहे. तरीही एकदोन ठिकाणी भिंतीवर "गो बॅक इंडिया" रंगवलेले दिसले. लष्कराचे सैनिक आताश्या या अश्या रंगरंगोटीकडे दुर्लक्ष करता बहुधा कारण लाल चौकात तर हे जागोजागी रंगवलेले आहे म्हणे. असेही लष्कराला ही रंगरंगोटी साफ करण्याऐवजी दर शुक्रवारी होणारी दगडफेक थांबवण्यात रस असणार. दर शुक्रवारी नमाज अदा करुन झाला की हजरतबलच्या परिसरात, लाल चौकात आणि सरकारी इमारतींच्या आसपास खच्चुन दगडफेक होते. हिंदुस्तानी मिडीया अपप्रचार करते तो असा. आपण या बातम्या कधीकधीच ऐकतो की काश्मीरी युवकांनी दगडफेक केली मग लष्कराने अश्रुधुराचा वापर केला वगैरे. प्रत्यक्षात जे दर शुक्रवारे घडते. दगड फेकण्यासाठी युवकांना चक्क पैसे दिले जातात. दुर्दैवाने आम्ही गेलो तो मंगळवार होता. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात थोडी कमाई करण्याचा चान्स हुकला. ;)
दल लेक, शंकराचार्य आणि हजरतबल या व्यतिरिक्त श्रीनगरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बागा. आधीच काश्मीर सुंदर, पाणी मुबलक, वातावरण फळाफुलांना आणि वृक्षांना पोषक. त्यामुळे मुगलांनी इथे भरपुर बागा बांधल्या. शहाजहान तर वर्षातले चार महिने म्हणे या बागांमध्येच असायचा. शिवाजीराजांनी जेव्हा शाइस्तेखानाची बोटे कापली तेव्हा औरंगजेब इथेच होता. त्याने मामांना परस्पर बंगालमध्ये पाठवुन दिले.
वास्तविक बागा बघण्यातला माझा इंटरेस्ट ट्युलिप्स बघण्यापुरता मर्यादित होता. एरवी बागांमध्ये प्रेमी युगुलांनी, सिनीयर सिटीझन्सनी नाहीतर पोराटोरांना घेउन संसारी माणसांनी जावे हे माझे स्पष्ट मत. सगळ्या बागा इथुन तिथुन सारख्याच. नाही म्हणायला ऊटीचे बॉटेनिकल गार्डन मला जबरदस्त आवडले होते. त्यामुळे ट्युलिप गार्डन बघुन इतर बागांमध्ये गेल्यावर एखाद्या चिनाराला पकडुन त्याच्या सावलीत मस्तपैकी ताणुन द्यायचा माझा विचार पक्का होता. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवसापासुन ट्युलिप गार्डन बंद झाले होते. ट्युलिपचा मौसम बर्यापैकी संपत आल्यामुळे. त्यामुळे आम्ही तडक मुघल गार्डनचा रस्ता धरला.
मुघल गार्डन्स मुख्यतः ३: चष्मेशाही, शालिमार आणि निशात. तिन्ही विस्तीर्ण आणि रम्य.
चश्मेशाहीचा आणि शाही चष्म्याचा काहीतरी संबंध असावा अशी मला राहुनराहुन शंका होती. प्रत्यक्षात चश्मा म्हणजे झरा. चश्मेशाही म्हणजे शाही झरा. याचे पाणी बिस्लेरीहुन शुद्ध असे आमचा ड्रायवर म्हणाला. पंडित नेहरु काश्मीरमध्ये वास्तव्यास असायचे तेव्हा त्यांचे पिण्याचे पाणी इथुनच जायचे म्हणे. प्रत्य्क्षात पाणी प्यायलो तेव्हा ड्रायवर म्हणाला होता ते खरे आहे हे पटले. पाणे थेट सिंहगडाच्या देव टाक्यातल्या पाण्याएवढे गार आणि गोड.
चष्मेशाही, शालिमार आणि निशात तिन्हीलाही आज मुघल गार्डन्स म्हणत असले तरी शालिमार मुळचे एका हिंदु राजाने निर्माण केले होते. प्रवरसेना त्याचे नाव. दुसर्या शतकात तयार केलेली ही बाग शालिमार म्हणजे प्रेमाचे आलय म्हणुन त्यानेच प्रसिद्ध केली. कालौघात ही बाग नष्टही झाली. नंतर जहांगीर बादशहाने त्याच जागेवर नव्याने बाग बांधली. आपल्या राण्यांच्या स्मरणार्थ त्याने या बागांना विविध नावे दिली पण आजाही ही बाग शालिमार म्हणुनच प्रसिद्ध आहे.
निशात बाग म्हणजे आनंदाचे आलय ही देखील मुघल बाग म्हणुन ओळखली जाते. पण या बागेचा जनक कोणी मुघल बादशाह नव्हता तर मुघल बादशाहा जहांगीर याच्या सासर्याने ही बाग तयार करुन घेतली. ही बाग पुर्ण झाल्यावर याच्या सौंदर्यावर जहांगीर सासर्याच्या मुलीवर भाळला होता त्याहुन जास्त भाळला. सासर्याने हे बाग आपल्याला आंदणा द्यावी म्हणुन जहांगीराने त्याची वारेमाप स्तुती केली. परंतु सासरेबुवा बधले नाहीत. हे बघुन जहांगीराने निशात बागेतल्या झर्याचे पाणी अडवले. तरीही सासरेबुवा बधले नाहीत. दु:खी मात्र झाले. विषण्णावस्थेत एकदा ते बागेत बसलेले असताना त्यांच्या नौकराला त्यांचे दु:ख बघवले नाही आणि मुघल बादशहाच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्याने पाण्याचा प्रवाह परत सुरु केला. हा औद्धत्याबद्दल वास्तविक त्याचा शिरच्छेदच व्हायचा पण त्याच्या स्वामोनिष्ठेवर खुष होउन जहांगीराने त्याला माफ केले आणि पाण्याचा स्त्रोत पुर्ववत सुरु केला.
निशात बाग आम्हाला लक्षात राहिली कारण अस्मादिकांनी त्या बागेत पाऊल ठेवल्यावर ओसामा बिन लादेनला अमेरिकेने उडवल्याची गोड बातमी कळाली. पाठोपाठ काश्मीरमध्ये हाय अॅलर्ट जाहीर झाल्याने आपली ट्रिप गंडतेय की काय अशी शंका उभी राहिली. परंतु सुदैवाने काश्मीर शांत राहिले. काही मशिदींमधुन दुखवटे पाळले गेले, ओसामाला श्रद्धांजली वाहिली गेली, लोक धाय मोकलुन रडले, लाल चौकात दुकाने बंद झाली ते वेगळे. पण किमान कुठे हिंसाचार नाही झाला.
बाकी या मुघल गार्डन्सचे एक अपृप आमच्यासाठी असे की इथेच पहिल्यांदा (विमानात बघितलेली सोडुन) हिमशिखरे दिसली. मन त्रुप्त झाले:
बाकी कुठल्याही बागेत दिसली तशी बरीच फुले या बागांमधुनही होती. खासकरुन मंकी फ्लॉवर्सः
आणि आजच्या भागाचा शेवट करण्यापुर्वी काश्मीरची शान असलेल्या चिनाराच्या पानाची ही मोट्ठी प्रतिकृती :) :
त्रास क्रमशः चालु
तळाटीपः हजरतबलची दोन्ही आणि शंकराचार्याचे हिमाच्छादित छायाचित्र जालावरुन साभार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.