Friday, August 12, 2022

उदंड देशाटन करावे - राजस्थान

  ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

Submitted by सेनापती... on 28 October, 2010 - 05:04

मुख्य टीप : वाचायला बसायच्या आधी काहीतरी खायला घेऊन बसावे नाहीतर खाऊन बसावे... वाचल्यावर भूक लागल्यास धागाकर्ता कुठलीही जबाबदारी घेणार नाही... 

जून २००८ ची गोष्ट. एके दिवशी अभिजित Y.H.A.I. म्हणजे यूथ होस्टेलच्या ट्रेक्सबद्दल माहिती घेउन आला "अरे, नोव्हेंबर महिन्यात राजस्थान स्टेटचा एक ट्रेक आहे. अरावली - रणकपुर - कुंभळगड़ ट्रेकिंग एक्सपिडिशन. तो करुया. तारखा पण फिट बसत आहेत." अभि-मनाली आणि मी तयार होतोच. अजून कोण-कोण येणार असे अनेकांना विचारल्यावर 'मी नक्की येणार' असे ऐश्वर्या एका पायावर उड्या मारत म्हणाली. अनुजाने सुद्धा यायचे नक्की केले. याशिवाय अभिचे संजीव उर्फ़ संजू आणि दिपक हे २ मित्र सुद्धा यायला तयार झाले. संजू हा 'संस्कृत शिक्षक' आहे तर दीपक एल.आय.सी. मध्ये कामाला आहे. अशी एकुण ७ जणांची टिम तयार झाली. आकडा नकी झाल्यावर अभिजितने ट्रेन आणि ट्रेक अश्या दोन्ही तारखा नक्की करून टाकल्या. राजस्थान यूनिटचे 'रतनसिंग भाटी' यांना आम्ही नेमके कुठल्या तारखेला येतोय ते कळवले. आणि सुरू झाली अजून एक भ्रमणगाथा...

९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता बोरीवली स्टेशनवरुन अरवली एक्सप्रेस पकडायची होती. मी, दिपक, अभिजित आणि मनाली ठाण्याहून संध्याकाळी निघालो. बाकी सर्व थेट बोरीवलीलाच भेटणार होते. कविता आम्हाला ट्रेनवर भेटायला येणार होती. गंमत म्हणजे संध्याकाळ ऐवजी ती सकाळीच ९ वाजता आम्हाला भेटायला बोरीवली स्टेशनला जाउन पोचली. मी सांगताना चुक केली की तिने ऐकताना ते माहीत नाही पण तिला एक हेलपाटा पडला हे नक्की. मग संध्याकाळी ती परत स्टेशनला आली. सर्वजण ९ च्या आसपास बोरीवलीला येउन पोचले होते. काही मिनिट्समध्ये ट्रेन येणार आणि आम्ही आमचा प्रवास सुरू करणार इतक्यात... "मला जाम भूक लागली आहे. ह्या ट्रेनमध्ये रात्री खायला मिळेल का रोहन... आपण काहीतरी खायला घेउन येऊया." - ऐश्वर्या उवाच. मग अभि आणि संजू दोघेजण पुन्हा स्टेशनच्या बाहेर गेले आणि समोसा, ढोकळा असे पटकन संपणारे, भूक भागवणारे पदार्थ घेउन आले. ते आले तरी गाडी काही अजून येत नव्हती. न राहून ते पदार्थ हादडणार तितक्यात गाडी आली. कविताला टाटा केला आणि आम्ही प्रवासाला सुरवात केली. ट्रेनमध्ये दिल्लीच्या मनोमयी दीदी सुद्धा होत्या. 'मनोमयी दीदी' म्हणजे अभि, संजू आणि दिपकच्या YHAI ट्रेक फ्रेंड. त्या महाराष्ट्र यूनिटच्या ट्रेकवरुन राजस्थान आणि मग तिकडून आपल्या घरी दिल्लीला जाणार होत्या. आता आम्ही ८ जण असल्याने एक आख्खा बर्थ आणि साईड बर्थ आमचाच होता. तेंव्हा तंगडया पसरल्या आणि गप्पा टाकत बसलो. त्या सोबत खादाडी सुरू झालीच होती. चांगले १२-१५ समोसे होते आणि ढोकळा अर्धा किलो तरी होता. या शिवाय अनुजाने घरून कोलंबी भात बनवून आणला होता तर दिपकने बोंबिल फ्राय. आयला आता हे माहीत असते तर समोसा, ढोकळा आणला असता का? मग काय ... आम्ही तर सुटलो होतो.

खाता-खाता अनुजा लडाखबद्दलच्या गोष्टी सांगत होती तर मध्येच दिपक-अभि-संजूच्या 'हर की दुन'च्या गोष्टी सुरू व्हायच्या. इतके खाल्ले तरी काही समोसे आणि बोंबिल फ्राय उरले. ते एका पिशवीमध्ये ठेवून खिडकीच्या मध्ये ती लटकवली. आजुबाजुला बसलेले लोक जसे आडवे व्हायला लागले तसे आम्हाला सुद्धा आवाज खाली करावे लागले. उगाच बाकीच्यांना कशाला त्रास नाही का. आम्ही सुद्धा आडवे झालो. मी आणि अभि समोरा-समोर अप्पर बर्थ वरती झोपलो होतो. पहाटे ३ वाजताच मला जाग आली. (रोहणा ... अजिबात बोलू नकोस कोणाला की तूला अवघ्या ३ तासात भूक लागुन जाग आली) हाताशी जवळच लटकवून ठेवलेल्या समोश्याच्या पिशवीमध्ये हात घालतो तोच अभि जागा झाला. 'भूक लागली आहे ना रे. दे मला पण एक समोसा.' मी बघतच बसलो. अभ्याचे हे रूप मला नवीन होते. समोसा खाल्यावर आम्ही पुन्हा झोपी गेलो. पहाटे अबू रोड आसपास ट्रेन येता-येता आम्ही जागे झालो पण अनुजा मात्र उठून पुन्हा बसल्या-बसल्या लुडकली होती. स्टेशनवर उतरलो तर सगळीकडे 'रबडी' आणि 'पापडी चाट'वाले दिसत होते. हातात वेळ नव्हता म्हणुन ती संधी हुकली आणि गाडी अबूवरुन 'फालना'ला निघाली. आम्हाला फालनावरुन 'रणकपुर'ला जायचे होते. तिकडून पुढे मग ट्रेक होता. आम्ही फालनाला पोचल्याची वर्दी रतनसिंग भाटी यांना दिली आणि एका जीप मधून रणकपूर जैन मंदिराजवळ असलेल्या बेसकैंपला पोचलो. तिकडे मुंबईचे काही लोक भेटले. ते ट्रेक पूर्ण करून परतत होते. आम्ही सामान लावले, जेवून घेतले आणि गप्पा मारत बसलो.

संध्याकाळी 'रणकपूर जैन मंदिर' बघायला गेलो. 'एक्लमटायझेशन' म्हणजे वातावरणाशी समरस होण्याचा तसा काही प्रश्न नव्हता. तासभर मंदीर बघून कैंप वर परत आलो. ग्रुप मधल्या इतर लोकांशी ओळख करून घेतली. कोणी बंगालमधले तर कोणी गुजरात, कोणी दक्षिणात्य तर कोणी उत्तरेकडचे. १८ एकजण होते एकुण. त्यात आम्ही ७ जण 'जय महाराष्ट्र' होतो. YHAI चे हे एक मस्त असते. अनेक विविध ठिकाणच्या लोकांशी ओळखी होतात. नव्याने बरीच माहिती कळते. अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे YHAI च्या कुठल्या ही कैंपला 'कैंपफायर' होत नाही. लाकडे कधीच जाळली जात नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण एकत्र जामुन.. 'फायर..फायर..कैंपफायर..' असे म्हणुन फारतर एखादी मेणबत्ती पेटवून कैंपफायरला सुरवात करतात. आजच्या गप्पांना काही मज्जा आली नाही. ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) आधीच गुडुप झाले होते. आम्ही तासभर दंगा केला आणि १० वाजता आपापल्या टेंट्स मध्ये जाउन बत्ती गुल केली. पण झोप लागेल तर ना. का विचारताय. घोरण्याची कोंपिटीशन सुरू होती तिकडे. अशी की आता घोरण्यात सुद्धा जोरदार भांडतील की काय. डोके उठले होते अक्षरश:. ह्यांच्या बरोबर ५ दिवस राहायचे. एका टेंट/ खोलीत झोपायचे? च्यामारी... बघुया पुढे पुढे काय होते ते...

***************************************************************************************

दिवस १ : स्वतः घोरून-घोरून, आमच्या जिवाला घोर लावून आणि आम्हाला जागे ठेवून ते 'घोरटे' (घोरून आमची झोप चोरणारे म्हणुन घोरटे) निवांतपणे झोपले होते. आम्ही मात्र उशिरापर्यंत जागे होतो. अखेर रात्री उशिराने कधीतरी आम्हाला झोप लागली. तरी सकाळी जाग लवकरच आली. हिमालयातील ट्रेक्सप्रमाणे पहाटे लवकर उठून बर्फ वितळातयच्या आधी जास्तीत-जास्त ट्रेक करायचा असे काही इकडे नव्हते. रात्रभर 'घोरून लढाई' केलेले काही वीर अजून सुद्धा अंथरुणात निपचीत पडलेले होते. आम्ही उठून आवरून घेतले. आंघोळ करायची नव्हतीच. का काय? डोंगरात आल्यावर डोंगरातले नियम पाळावे लागतात. तेंव्हा नको ते आंघोळ वगैरे करायचे विचार मनात आणायचे नाहीत. आम्ही नाश्त्याची आणि नाश्ता आमची वाट बघत होताच. उदरभरण झाले आणि मग आम्ही निघायची तयारी केली. सॅक्स पाठीवर मारल्या आणि 'मालघाट'कडे निघालो. रणकपुर पासून मालघाटचे जंगल अवघे ३ किमी लांब आहे. जायचा रस्ता पक्का डांबरी आहे तेंव्हा आम्ही ट्रकमध्ये बसलो आणि मालघाट जंगलाच्या गेटकडे निघालो. काही मिनिट्समध्ये मालघाटच्या गेटवर पोचलो.

इथपासून फक्त १३ किमी. ट्रेककरून संध्याकाळपर्यंत 'फूटादेवल' याठिकाणी पोचायचे होते. आता सकाळचे किती वाजले होते ते माहीत नाही पण थोड़े-थोड़े ऊन लागायला लागले होते. संजूने भाटीसरांची एक छोटीशी मुलाखत घेतली. की ट्रेक कसा आहे... जायचा रूट काय-काय आहे वगैरे वगैरे... आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये आम्ही सर्वात तरुण होतो. तेंव्हा आम्ही पटापट ट्रेक करत पुढे जाऊ आणि ज़रा वयस्कर असलेले थोड़े मागे राहतील असा भाटीचा अंदाज होता बहुदा. पण हे काय? सुरुवातच आम्ही 'जाऊ दे त्याना पुढे आपण सावकाश जाऊ मागुन आणि कव्हर करू' ह्या स्टाइलने केली. आमच्या सर्वांच्या सॅक्समध्ये कपडे कमी आणि खायचे सामान जास्त भरले होते. शिवाय फालनावरुन घेतलेली केळी आणि मोसंबी सर्वांच्या साइड पॉकेटला लटकत होती. ती संपवणे गरजेचे होते. तेंव्हा जसा ट्रेक सुरू झाला तसे आम्ही सुद्धा 'सुरू' झालो. जणू काही ट्रेक फ़क्त १ दिवसाचा आहे ह्या स्पीडने आम्ही खात होतो आणि त्याविरुद्ध ट्रेक बहुदा १०-१२ दिवस मोठा आहे ह्या स्पीडने चालत होतो. मस्त मज्जा करत. घाई काय होती. उगाच आपले पुढे पळत जाउन भोज्जा करायचा ह्यात कसली मज्जा येते लोकांना काय माहीत. आमच्यात पण असे होते काहीजण. अरे लोकांनो ट्रेकची मज्जा घ्या. निसर्ग बघा. गप्पा टाकत जा. नाहीतर १०-१५ वर्षांनी हे असे लिहायला घेतले ना की काही आठवणार नाही... Happy मग बोलाल अरे हां तेंव्हा तर १०-१० की दौड़ करून पोचलो होतो नेक्स्ट डेस्टीनेशनला.

वाट एकदम सोपी होती. मध्येच कच्चा गाडीरस्ता लागायचा. आम्ही निवांतपणे बसायचो. धमाल गप्पा टाकत पुढे जायचो. आमचा ट्रेक गाईड शिवसिंग बोंबा मारू लागला की मग थोड़े पुढे सरकायचे. वाट सरत होती... मोसंबी संपत होती... आणि सॅक्स हलक्या होत होत्या. एके ठिकाणी मध्येच ऐश्वर्याला बीटल्स दिसले. हिरवे-हिरवे आणि त्यावर काळे ठिपके. ३ जणांचे कुटुंब होते त्यांचे एक. तिकडे त्यांचे फोटोसेशन झाले. मग ऐश्वर्याला ते उचलून घ्यायची हुक्की आली. मग त्यांचे तिच्याबरोबर पुन्हा एकदा फोटोसेशन झाले. पुन्हा बीटल्सना त्यांच्या घरी सोडले अणि आम्ही पुढे निघालो. वळणा-वळणाचा रस्ता हा हळू-हळू वर चढत होता. पण अगदीच हळू. नाहीतर आपला सह्याद्री. असा चढतो-उतरतो की काय विचारू नका. ह्या संपूर्ण प्रदेशात तसा पाउस कमी. त्यामुळे आपल्यासारखी गर्द झाड़ी नव्हती पण थोर वृक्ष मात्र होते. मधुनच पक्ष्यांचे आवाज कानी पडायचे. याशिवाय एखादा जोक झाला की 'संजू' या प्राण्याचे सुद्धा आवाज मोठ्याने ऐकू यायचे. आम्ही ७ जण सर्वात शेवटी 'व्यू जंगल पॉइंट'ला पोचलो.

सर्वजण आधीपासून तिकडे जाउन टेकले होतेच. मालघाट जंगलाचे इकडून मस्त दर्शन होत होते. ज्या रूटने आलो तो थोड़ाफार दिसत सुद्धा होता. ते दृश्य बघत ज़रा तिकडे विसावलो तर शिवसिंग लगेच म्हणाला,"चलो. थोड़ा आगेही खाना खाने रुकना है. आप पहेले दिनसे ही पीछे, तो पूरा ट्रेक पिछेही रहोगे." मी म्हटले,"शिवसिंगजी हम आगे जानाही नही चाहते. आप चलिए. हम आ जायेंगे." तो आपला निघाला पुढे. आम्ही फारवेळ गप्पा मारत बसलो नाही कारण दुपार होउन गेली होती आणि भूका लागल्या होत्या. (इतके खाऊन पुन्हा भूका कश्या लागतात.. काय कळत नाय राव..) जरा पुढे गेलो तर उजव्याहाताला खाली एक ओढा दिसला. तिकडे सर्वजण जेवत होते. आम्ही सुद्धा मोर्चा तिकडे वळवला आणि ओढयाकाठी जेवून घेतले. २ वाजून गेले होते. तिकडून पुढे निघालो आणि फूटादेवलच्या दिशेने निघालो. काही वेळात जंगलाची ह्या बाजूची भिंत दिसू लागली. त्याचबाजुला आमच्या पुढे काही शर्यतीतले ट्रेकर्स दिसत होते. अचानक शिवसिंग डावीकडच्या एका कच्च्या वाटेने आत घुसला. आम्हाला कळले की हा शोर्टकट आहे. आम्ही त्याच्यामागून त्या वाटेने अर्धे अंतर वाचवून एकदम पुढे पोचलो. आता जंगलाची भिंत ओलांडून आम्ही बाहेर पडलो आणि एका टेकडीला वळसा घालून 'फूटादेवल' गावाकडे निघालो. तितक्यात शिवसिंग बोलला. "इस पहाड के बायेसे से जायेंगे. और एक शोर्टकट है. बाकी लोगोंको जाने दो दाये के रास्तेसे" पहिल्याच दिवशी पठ्याला कळले होते की हे कुठल्या पद्धतीचे ट्रेकर्स आहेत ते. शिवसिंगने दाखवलेल्या शोर्टकटने आम्ही १० मिनिट्समध्ये गावाच्या वेशीवर जाउन पोचलो. ते सुद्धा सर्वांच्या पुढे. गावात जैनमंदिराबाजुला असणाऱ्या जागेमध्ये आमची कैंपसाईट सेट केली गेली होती. तिकडे जाउन एका बाजुला सामान टाकले. एका बाजुला झोपणे सोइस्कर होते कारण रात्री चहुबाजूंनी हल्ला झाला की आमची काय गत होणार होती ते आम्हाला माहीत होते.

संध्याकाळ होत आली तसे आम्ही आसपास भटकायला निघालो. जैन मंदिरासमोरच एक पडके शंकरमंदिर होते. तिकडे शेजारी राहणारे पुजारी चक्क मराठी आणि आपल्या 'कल्याण'चे निघाले. नाव लक्ष्यात नाही आता त्यांचे. राजस्थानमध्ये नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते असे ऐकून होतो. पण आम्हाला मात्र अजिबात थंडी वाजत नव्हती. जेवण बनत होते तोपर्यंत तिकडेच बाजुला असणाऱ्या एका दुकानातून ज्यांना हवे त्यांनी घरी फोन केले. रात्री जेवणानंतर जास्तच धमाल आली. अनुजाच्या मोडक्या डाव्या हाताला आणि माझ्या मोडक्या उजव्या पायाला (सप्टेंबर महिन्यात उजव्या पायाच्या घोट्याजवळ लिगमेंट दुखावल्यामुळे मी दीड महिना घरी बसून होतो. कामावर देखील जाऊ शकलो नव्हतो. पुन्हा कामावर जायच्या आधी थेट ट्रेकला... ) ऐश्वर्याच्या मोडक्या पायाची सोबत मिळाली. त्याचे झाले असे.. की आमचे जेवण सुरू होते तेंव्हा दुरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. त्यावरून मी काहीतरी जोक मारला आणि ऐश्वर्याला हसण्यासाठी तितके कारण पुरेसे होते. खरेतरं तिला हसायला कारण लागत नाही. हसता-हसता ती मागे सरकली आणि धापकन पडली. पाय मुरगळला आणि दुखत होता तरी मध्येच हसणे सुरूच होते तिचे. माझ्या पायासाठी आणलेले एक्स्ट्रा क्रेप बाँडेज तिला दिले लावायला मग. रात्री पुन्हा एकदा ग्रुपमधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) गुडुप झाले. आम्ही फ़क्त ७ जण जागे होतो कैंपफायर करायला. ११ वाजता झोपायला गेलो तेंव्हा घोरण्याची कोंपिटीशन सुरू झाली होती. आज मी घोरणाऱ्या सर्वांच्या अंगावरुन नाचत थैमान घालेन की काय असे वाटत होते. पण तसे काही मी केले नाही. आज मात्र कालपेक्षा सुरात घोरत होते ३-४ जण. भांडत नव्हते. प्रत्येकाने आपापला टाइमस्लोट घेतला होता. इकडून एकदा तर तिकडून एकदा असे आवाज यायचे. मध्येच संजू खोटे-खोटे त्यापेक्षा जोरात घोरायचा... मी, अभि अणि दिपकची हसून हसून पुरेवाट. आमच्यासारखे अजून २-३ पीड़ित होते. राजस्थान मधलेच होते ते तिघे. त्यातला एकजण उठला आणि त्याच्या पासून दुरवर घोरणाऱ्या एकाला त्याने उशी फेकून मारली. घोरणाऱ्या व्यक्ति अचानक शांत झाली, कुस बदलली आणि पुन्हा घोरायला लागली. आता आम्ही असे फुटलो की काही विचारू नका. अखेर रात्री उशिराने पुन्हा एकदा आमच्या झोपेने घोरण्यावर मात केली आणि आम्ही निद्रेच्या अधीन झालो.

उदया सकाळी आम्हाला 'वीरों का मठ' मार्गे कुंभळगड़ येथे पोचायचे होते. कुंभळगड़ - जेथे जन्म झाला महाराणा प्रताप यांचा...

क्रमश: ..

दंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

Submitted by सेनापती... on 29 October, 2010 - 05:21

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान' ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. एकेकाची शेपटी ही........ मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे.

नाश्ता हादडला आणि निघणार तितक्यात गावातला एकजण आख्खी टोपली भरून सिताफळ विकण्यासाठी घेउन आला होता. त्याने ती टोपली खाली ठेवल्या-ठेवल्या आम्ही बोललो. 'कैसे दिया?' त्याची भाषा जरा राजस्थानी असल्याने काही शब्द आम्हाला कळले नाहीत. मग शिवसिंग बोलला. '१५० रुपया'. आम्ही म्हटले 'काय? फ़क्त १५०?' त्या टोपलीमध्ये किमान ६०-७० सिताफळे होती. ती सुद्धा चांगली मोठी-मोठी. आम्ही सर्वांनी मिळून ती टोपली घ्यायची ठरवली.

पण बाकीचे ट्रेकर्स रडू लागले की 'इतना क्या करना है? कौन खायेगा?' मग आम्ही त्या सर्वांच्या हातावर ४-५ सिताफळे टेकवली आणि बाकी सर्व पैसे देऊन स्वतःच्या ताब्यात घेतली. हे असे घबाड हातात आल्यावर कोण सोडेल काय... Lol इतकी सारी घेतली खरी पण ती ठेवायची कुठे हा प्रश्न होतच. मग काही माझ्या सॅक्समध्ये काही दिपकने एका हातात पिशवीत घेतली. बाकी सर्व आम्ही तिथल्यातिथे फस्त केली. अखेर ती 'फळे रसाळ गोमटी' खाऊन झाल्यावर आम्ही ट्रेकरूट वर निघालो. आल्यामार्गे थोड़े मागे जाउन पुन्हा कालच्या त्या टेकडीला अर्धा वळसा मारत आता पलीकडच्या बाजुला पोचलो आणि मग तिकडून खालच्या बाजुला डावी मारत पुढे निघालो. आजच्या दिवसात फ़क्त १२ किमी. ट्रेककरून कुंभळगड़ येथे पोचायचे होते.पल्ला तसा लांबचा नव्हता. तेंव्हा पुन्हा एकदा आम्ही 'जाऊ दे सर्वांना पुढे' असे म्हणत फुरसत मध्ये होतो. काही अंतर पुढे जातो न जातो तोच सगळीकडे उशाची शेती दिसू लागली. मला तर एकदम कोल्हापुरला आल्यासारखे वाटले. ऊस पाहिल्या-पाहिल्या पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'रोहन मला ऊस हवाय खायला' मग आम्ही सर्वच उसाच्या शेतात शिरलो. पण ऊस काही मिळाला नाही. कारण ज्याचे शेत होते तो काही तिकडे आसपास नव्हता. तोडून घ्यावा असे मनात आले होते एक वेळ पण म्हटले नको. पुढे मिळाला की घेउच.

तिकडे संजू उसाच्या शेता शेजारी असणाऱ्या रहाटावर जाउन बसला. राजस्थानात पाउस तसा कमीच. तेंव्हा जमीनीखालील पाणी सुद्धा कमीच. असते ते सुद्धा खोलवर. तेंव्हा इकडच्या विहिरी सरळसोट खोल आणि बांधीव असतात. त्यातून पाणी काढताना रहाट हाताने खेचायच्या ऐवजी बैलजोड़ी वापरून मोट लाउन खेचले जाते. यामुळे कमी वेळात जास्त पाणी निघते. हे यंत्र कसे असते ते फोटोमध्ये बघू शकता.

\

काटकोनात असलेली २ चाके एकमेकात गुंतवली असतात. बैल जसे-जसे गोल-गोल फिरत लाकडाला बांधलेले वरचे आडवे चाक फिरवतात तसे खालचे चाक उभे फिरू लागते. ह्या चाकाला समांतर असे दुसरे चाक विहिरीवर बसवलेले असते. त्यावर बसवलेल्या असतात लोखंडी पटया आणि पाणीवर भरून आणणारे लोखंडी डबे. ही खालची चाके फिरून-फिरून पाणी वर काढत राहतात. ह्यात २ पद्धती असतात. आपण आधी पाहिली ती एक आणि दुसरी म्हणजे विहिरीच्या थेट वरती बसवलेले रहाट.

ह्यात समांतर असे दुसरे चाक बसवायची गरज नसते. जिथे थेट विहिरीच्या एकदम बाजुला बैल फिरवायला जागा नसते तिकडे पहिली पद्धत वापरून पाणी उपसा केला जातो. तिकडे १०-१५ मिनिट्स आम्ही 'पाणी उपसा' पद्धत बघत उभे होतो. बाकी बरेच ट्रेकर्स पुढे चालू पडले होते. आमच्यात बरेच अंतर सुद्धा पडले होते. सर्वात शेवटी आम्ही तिकडून निघालो आणि मग पक्क्या डांबरी रस्त्यावरुन 'वीरों का मठ' या गावाकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता ऊसच-उस होता. पण एक मिळेल तर शप्पथ. ऐश्वर्याचे 'मला ऊस.. मला ऊस..' सुरूच होते. शेवटी म्हटले 'आता त्या शेतात घुस.' जागोजागी ऊस आणि त्याच्या बाजुला बैलजोड़ीचे रहाट. दूरच्या शेतात एक मस्त दृश्य टिपायला मिळाले.

आपल्या बैलजोड़ी सोबत शेतकरी रहाटावर पाणी उपसत होता आणि ते पाणी पाटातून वाहत शेताकडे जात होते. ते दृश्य टिपायला मी एकटाच मागे थांबलो होतो. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. काही वेळात मी पुढे जाउन पोचलो तर सर्वजण रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसले होते आणि उरलेली सिताफळे आणि मोसंबी खात होते. कितीही खाल्ली तरी मन भरेना अशी गोड गोड सिताफळे होती ती. बाजुच्या एका गावातली शाळात सुटली होती आणि लहान लहान मूले सर्वांकडे पेन मागत होती. लडाखमध्ये सुद्धा आम्हाला हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला की मूले खाऊ किंवा पैसे ऐवजी पेन मागत आहेत आमच्याकडे मात्र त्यांना द्यायला पेन काही नव्हते... Sad

तेंव्हा तिकडून पुढे निघालो. इतक्यात एक पोलिस जीप आमच्या शेजारी येउन थांबली आणि त्यांनी आम्ही कुठून आलोय, कुठे जातोय हे सर्व विचारले. मुंबईहून आलोय असे सांगितल्यावर तर काय गप्पाच मारायला लागले. आम्ही अजून मागे-मागे राहू म्हणुन कसे बसे त्यांना सांगून पुढे सटकलो. ५ मिनिट्स वरतीच वीरों का मठ होता.

हे एक शंकर मंदीर आहे. शिवाय आतमध्ये एक गणेशमंदिर सुद्धा आहे. आम्ही दर्शन घेउन ज़रावेळ आत विसावलो. मंदिरात वापरलेला दगड आसपास इतके ऊन असुनही कमालीचा थंड होता. शिवाय मंदिरात एक छोटीशी विहीर होती त्यातले पाणी तर एकदमच गारेगार. मस्तपैकी फ्रेश झालो आणि पुढे निघालो. दुपारचे २ वाजून गेले होते आणि जवळचे पाणी पुन्हा संपत येत होते. पण पाणी किती ते प्यायचे... राजस्थानला आल्यापासून दूध-दही-ताक असे काहीच चाखले नव्हते. ते कुठे मिळेल का ते आम्ही बघत होतो. नशिबाने पुढच्या गावातच एका घरात आम्हाला दही - ताक प्यायला मिळाले. झाले असे की आम्ही गावात गेल्या-गेल्या ऐश्वर्याने एका बाईला विचारले की कुठे ताक-दही मिळेल का. तर ती म्हणाली,"आप यहाँ बैठिये, मै लेके आती हू." आणि त्या बाईने चांगले हंडा भरून ताक आणि वाडगा भरून दही समोर आणून ठेवले. अहाहा.. जो काही थकवा होता ते ताक प्यायल्यावर असा पळून गेला. भूका सुद्धा लागल्या होत्या मग सोबत ड्रायफ्रूट कचोरी असा कोंम्बी जमला. इतके सर्व होईपर्यंत ती बाई शेतात जाउन नवरयाला जेवण देऊन आली होती. तिला पैसे द्यायला गेलो तर ती घेईना. 'नहीं नहीं. इसके कैसे पैसे' ऐकेच ना. मग शेवटी तिच्या पोराला आम्ही खाऊ दिला. तृप्त होउन 'अन्नदाता सुखी भव' असे म्हणत आम्ही तिकडून निघणार तितक्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'यहा गन्ना मिलेगा?' त्या बाईने हिला शेतातून ऊस सुद्धा आणून दिला. अखेरची शांत झाली एकदाची ती.

आता कुंभळगड़ अगदीच जवळ आले होते. आम्ही आता 'आरेठ की भागल' या गावातून पुढे निघालो. गावातल्या शाळेसमोर एका पिंपळाच्या झाडावर चिक्कार वटवाघुळे लटकली होती. चक्क दुपार असून सुद्धा. थोड़े पुढे जातो तोच आमचा गाईड शिवसिंग म्हणाला,"यहाँसे आगे जा रहे हे; तो मेरे घर भी चलिए". अरेच्या हे तर त्याचेच गाव होते. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. काहीजण मात्र 'नही-नही हम आगे जायेंगे' करत पुढे निघून गेले. कसे असतात ना काही लोक. तो इतका घरी बोलावतोय आणि हे आपले सुटले आहेत. आम्ही मात्र त्याच्या घरी गेलो. चांगले १ मजली घर होते. खालची खोली बंद होती. बहुदा सामानाची असावी. बाहेर छोटासा गोठा होता. त्यात एक गाय आणि तिचे वासरू होते. आम्ही जीने चढून वर गेलो. छोटीशी गच्ची होती आणि मागे खोल्या. आम्ही गच्चीवर विसावलो. शिवसिंगने आतून २-३ कटोरी भरून दही आणले. ऐश्वर्याला देत म्हणाला,"ये भी चख के देखिये." मग त्याने बाकीच्यांना सुद्धा दही दिले. इतके गोड दही नाही बा मी चाखले कधी. काही वेळात आम्ही तिकडून निघालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता उसाची शेती संपली होती आणि रस्त्याच्या बाजुला झाडांवर सिताफळे दिसत होती. गावानंतर कच्चा रस्ता संपला आणि आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. कुंभळगड़चा बोर्ड सुद्धा दिसला. थोडेसे पुढे लगेच रस्त्याच्या बाजुला 'लकी होटेल' लागले. आमचा आजचा ठिकाणा हाच होता.

तिकडे एकुण ३ खोल्या होत्या. २ पुरुषांसाठी तर १ स्त्रीयांसाठी. शिवाय बाहेर काही खाटा टाकल्या होत्या. पण त्या आम्ही येईपर्यंत आधी पोचलेल्या काही जणांनी पटकावल्या होत्या. आम्ही मग एका खोलीत आमचे सामान ठेवले आणि आसपास चक्कर मारायला बाहेर पडलो. राजस्थानमध्ये आल्यापासून म्हणजेच ३ दिवस झाले होते तरी काहीही मांसाहांरी जेवण झाले नव्हते. तेंव्हा इकडे तरी काही मिळते का ते बघायला खरे तर आम्ही निघालो होतो. जवळच एक छोटेसे दुकान सदृश्य होटेल दिसले. त्याला विचारले तर मॅगी मिळेल असे म्हणाला. आम्ही आत जाउन बसलो तर आम्हाला येउन विचारतो कसा. 'कैसे मांगता है? वेज या ......' त्याचे बोलणे देखील पूर्ण न होऊ देता मी त्याच्या छोट्याश्या किचनमध्ये डोकावलो. 'नॉन-व्हेज भी है?' तो उत्तरला,"नही नही. मी पूछ रहा हू व्हेज चाहिए या प्लेन चाहिए.' हात्तीच्या.. आज सुद्धा काही नॉन-व्हेज मिळायचे नव्हते. थोडीशी खादाडी करून होटेलवर परत आलो. ७ वाजत आले होते. चहा घेतला आणि कुंभळगड़च्या दिशेने निघालो.

दररोज रात्री ८ ते ८:३० ह्या अर्ध्या तासात इकडे 'लाईट शो' असतो. पहिल्या रामपोल दरवाजा ते वरच्या बदाम महालापर्यंत सर्वत्र यल्लो लाइट्स लावलेले आहेत. अत्यंत सुंदर दिसतो कुंभळगड़. आपल्याकडे कधी करणार असे टुरिझम देवजाणे. तिकडे अर्धातास थांबुन आम्ही काही फोटो घेतले आणि मग जेवणासाठी होटेलवर परतलो. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होटेल बाहेर रस्त्यावर बसलो होतो. झोपायला म्हणून आत गेलो तेंव्हा त्या छोट्याश्या खोलीत घोरण्याचा इतका आवाज येत होता की असह्य झाले होते. शेवटी सामान उचलले आणि बाहेर येउन झोपलो. आत्ता कुठे ९:३० होत होते आणि ह्यांचे फुल ऑन 'घोरायण' सुरू झाले होते. ऐश्वर्या, मनाली आणि अनुजा सुद्धा त्यांच्या खोलीमधून बाहेर येउन आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक माझ्या अंगात काय आले माहीत नाही पण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्यानंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. खरंतरं हां कैंपफायर आयटम होता. संजू, अनुजा आणि ऐश्वर्या इतके जोरात हसत होते की झोपलेले जागे झाले आणि घोरणारे सुद्धा उठले. सत्संग प्रवचन पासून शोलेवाला, आणि डिनर पासून ते न्यूज़ रीडर पर्यंत असे सर्वच्यासर्व आयटम मी १ तास करून दाखवले. संजू पाय वर घेउन आणि लोळून-लोळून राक्षसी हास्यासकट फुटला होता. अखेर १०:३० वाजता मुलींच्या खोलीमधून एक बाई बाहेर आली आणि तिने कैंपलिडरकडे तक्रार केली. आम्ही म्हटले १०:३० तक तो कैंपफायर का टाइम होता हे सर. पण मग आम्ही झोपून गेलो. त्या एकतासात जी काही मज्जा आली ती पुन्हा नाही आली कधी. Lol

गेले २ दिवस आम्हाला जागे ठेवून स्वतः घोरायण करणारया घोरटयान्ना आज आम्ही जागे ठेवले होते. थोड्या वेगळ्या स्टाइलने. शेवटी ११ वाजता आम्ही गुडुप झालो. सकाळी लवकरच निघायचे होते... कुंभळगड़ बघायला...

क्रमश:

 कुंभळगड़ मार्गे ठंडीबैरी ... !

Submitted by सेनापती... on 2 November, 2010 - 19:10

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.

आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो.

कुंभळगड़ --- राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६ नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे. नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. किल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत.

दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे.


निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आणि त्यातील शंकराची पिंड.

राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ...


महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ.

७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो. बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो. मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.

अवघ्या ३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़ बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान ऑमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३ दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ऑमलेट नाश्ता झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है." पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो.

आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी ( ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो. बघता-बघता अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी केली. बाकी लोक परत आले तसा आम्ही यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो.

तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो. जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक. थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही. आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन पोचलो.

संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ... बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर करायला नव्हतेच. काही वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. Lol नंतर झोपायला गेलो तर घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे' आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? रात्री बऱ्याच उशिराने आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...

'माउंट अबू'कडे प्रयाण ...

ट्रेकच्या चौथ्या दिवशी सकाळी अखेर सर्व 'जडबुद्धी' लोकांचे शेवटचे घोराख्यान संपले. आम्ही उठून निघायची तयारी केली. गेस्टहाउसच्या बाहेर पडलो. जंगलातली सकाळ म्हणजे कशी एकदम आल्हाददायक ताजीतवानी असते. हळूवार वाहणारे वारे आणि पानांची होणारी सळसळ, त्यामधून येणारे पक्ष्यांचे गुंजन, सर्वच कसे एकदम मनाला नवी चेतना देणारे. नळावरती थंडगार पाण्याखाली हात घालून तोंड धुवून घेतले आणि ब्रश तोंडात घातला तर... अररर... हे काय टूथपेस्टच्या जागी झाडपोला मलम...!!! Lol डोळ्यावर होती-नव्हती ती झोप उडली. सकाळ-सकाळ तोंडाची चव बिघडली. नशीबाने दिपककडे एक ब्रश होता. मग तो घेतला आणि दात घासले. ख़राब झालेला ब्रश कागदात गुंडाळून सामानात कोंबला. लक्ष्यात ठेवा... निसर्गात काही म्हणजे काहीही टाकायच्या विरोधात आहोत आम्ही.

"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."

नाश्त्याला चक्क पोहे बनवले होते. ते सुद्धा अनुजाने. आज नाश्ता काय आहे ते बघायला घुसली किचनमध्ये आणि पोहे बघून मग त्याला ज़रा आपला 'होममेड टच' देत बसली. मस्त झाले होते पोहे. आटपुन तिकडून निघालो आणि 'मुछाला महावीर'कडे निघालो. आज फ़क्त ३ किमी. ट्रेककरून आमचा प्रवास संपणार होता. तेंव्हा घाई तशी नव्हतीच. वाट सुद्धा सपाट होती. जंगल विरळ होत चाललेले स्पष्ट दिसत होते. तासाभरात ट्रेक संपवून बाहेर पडलो आणि 'मुछाला महावीर'कडे मोर्चा वळवला. हे एक जैनमंदीर आहे. मार्बलवरील अतिशय सुंदर कारागिरी येथे बघायला मिळते. तिकडून निघालो ते थेट ट्रकमध्ये बसून पुन्हा बेसकैंपकडे. ४५ मिं.मध्ये रणकपुरला पोचलो. भाटीकडून ट्रेक पूर्ण केल्याची सरटिफिकेट्स घेतली आणि फालना स्टेशनकडे निघालो. जाता-जाता 'माउंट आबू' आणि जगप्रसिद्ध 'दिलवाडा मंदिर' बघायला निघालो.

समाप्त..... 

https://www.maayboli.com/node/20962

 

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat )

 

विराट नगर

जयपुरला तिसर्‍यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव.  जयपूरच्या आसपास  फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली.  त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.

 जयपुर जवळील प्रसिध्द मंदिर खाटू श्यामजी . याची कथाही महाभारत आणि भीमाशी निगडीत आहे. भीमाला हिडींबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांना अंजनपर्व , मेघवर्ण आणि बर्बरिक ही तीन मुले होती.  त्यातील बर्बरिक देवी भक्त होता. त्याला देवीकडून तीन दिव्य बाण मिळाले  होते. महाभारताचे युध्द चालू होण्यापूर्वी बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिले होते, " युध्दात जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेन". (हारे का सहारा)

 ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली , जर बर्बारिक, आईला दिलेल्या वचना प्रमाणे हरणार्‍या कौरवांच्या बाजूने लढला तर त्याच्याकडे असलेल्या तीन दिव्य बाणांमुळे तो युध्दाचा निकाल बदलून टाकेल . हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रुप घेतले आणि तो बार्बरिकला भेटायला गेला.  त्याच्या कडील  दिव्य बाणांची परिक्षा घेण्यासाठी श्रीकृष्णाने समोर दिसणार्‍या पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भोक पाडायला सांगितले. त्याप्रमाणे बर्बारिकने सोडलेल्या बाणाने झाडाच्या सर्व पानांना भोक पाडून तो  बाण ब्राम्हणाच्या पाया जवळ आला. कारण श्रीकृष्णाने एक पान पाया खाली लपवलेले होते. श्रीकृष्णाने पानावरुन पाय काढताच बाणाने त्या पानाचाही वेध घेतला. बाणाची दिव्य शक्ती पाहून ब्राम्हणरुपी श्रीकृष्णाने बार्बारिककडे दान मागितले. बर्बरिकने काय हवे ते माग असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने त्याचे शिर दान म्हणून मागितले. हे विचित्र दान ऐकल्यावर बर्बरिकला कळले या ब्राम्हणाच्या वेषात दुसरेच कोणीतरी आहे. त्याने ब्राम्हणाला मुळ रुपात प्रकट होण्याची विनंती केली. समोर साक्षात श्रीकृष्णाला पाहून त्याने आपले शिर त्याला अर्पण केले.  श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात तू माझ्या "श्याम" या नावाने पूजला जाशील. आता राजस्थानातील खाटू  या गावात बर्बरिक म्हणजेच "खाटू श्यामचे" मंदिर आहे. बर्बारिकने श्रीकृष्णाला युध्द पाहायचे आहे असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याचे शिर खाटू जवळील उंच टेकडीवर ठेवले तेथून त्याने युध्द पाहिले

 

पांडू पोल, सरिस्का


महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.

 महाभारतातील विराट पर्वात  उल्लेख असलेली तिसरी घटना म्हणजे पांडव अज्ञातवासात वेष बदलून एक वर्ष विराट राजाच्या पदरी राहीले .अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा मध्ये रूपांतर झाले होते. त्याने राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी ही विराट नरेशाची पट्टराणी सुदेष्णा हिची केशभुषाकार म्हणून राहीली होती. नकुल हा अश्वपाल तर, सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव म्हणुन भोजनगृहात काम करत होता. विराट नगर मध्ये एक टेकडी भीम डुंगरी नावाने  प्रसिध्द आहे.

 

Remains of Stupa, Virat Nagar

सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व त्याच्या आसपास पसरलेले आहेत.  प्राचीन मंदिर आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही  ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.

 

बिजक की पहाडीची पायवाट

विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या जाणार्‍या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.  पायथ्यापासून एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते. इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते.   उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो. त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात. या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात   मगरीच्या तोंडा सारख्या दिसणार्‍या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे.  या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे.  गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.

 

श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी


मंदिराच्या टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीला कुंपण घातलेले होते. पुढचा टप्पा चढून कुंपण पार करुन सपाटीवर प्रवेश केला . या भागात पूरातत्व खात्याने उत्खनन करुन शोधून काढलेला बौध्द स्तुप,  भिख्खुंच्या राहण्याच्या जागा , पाण्याचे कुंड यांचे अवशेष आहेत. बौध्द स्तुप आज अस्तित्वात नसला तरी त्याचा पाया आणि प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळातो.  स्तुपाचा व्यास ८.२३ मिटर असुन त्याचा घुमट २६ अष्टकोनी खांबावर तोललेला होता. हे खांब बसवण्यासाठी असलेल्या खाचां आजही पाहायला मिळतात . या खाचांमुळे एखाद्या दाते (Gear) असलेल्या यंत्राच्या चाकाप्रमाणे स्तुपाचे अवशेष दिसतात. स्तुपा जवळ असलेला सम्राट अशोकाचा शिलालेख इसवी सन १८४० मध्ये ब्रिटिश सेनाधिकारी कॅप्टन बर्ट याने कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवला. आजही  तो तिथे पाहायला मिळतो.

Remains of Virat Nagar


Water tank at Bijak ki Pahadi


विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्‍हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्‍यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली. त्यांनी शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेत असे अशीच लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६  राज्ये स्थापन झाली . ती १६ महाजनपद या नावांने ओळखली जातात.  बौध्द आणि जैन ग्रंथात  १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स  या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.


 

१६ महाजनपद, Courtesy google.com

प्राचीन भारतात  १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही  मत्स्य महाजनपदाची राजधानी होती.  मौर्यांच्या काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते.  त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.

Cave temple, Virat Nagar
 

स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्‍या  स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे. 

 

गणेश मंदिर, विराट नगर

बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.  

 

Clay Objects, Virat Nagar 

Punch Marked Coins, Virat Nagar

Indo Greek Coins, Virat Nagar

विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून काढले.  या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात  मिळालेल्या अश्मयुगीन दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते .  विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली  आहेत .  याशिवाय  अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या  काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी  इत्यादी आहेत.  या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग  (युआनच्वांग)  विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.  आपल्याच संस्कृती,  इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?

संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.

सम्राट अशोक शिलालेख,

पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे  पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.

 


भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर  अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे.  मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.    

मुघल गेट (पंचमहाल)


जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

 

Jain Temple , Virat Nagar


Adinatha, Virat Nagar


विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. 

 

 

जाण्यासाठी :-

 विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे.  याभागात बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड -  विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

झपाटलेला (?) किल्ला,  भानगढ  (Bhangarh , the most haunted (?) fort) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html

"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.

  

Shree Ram Mandir built by Pandava


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

झपाटलेला (?) किल्ला, भानगढ (Bhangarh , the most haunted (?) fort)

Bhangargh , Rajasthan
Hounted (?) Bhangarh

सह्याद्रीत किल्ले भटकताना रात्रीचा मुक्काम किल्ल्यावर असला की, जेवण झाल्यावर शेकोटी भोवती भुतांच्या गोष्टींचा फड जमतो. ग्रुप मध्ये भुतांच्या गोष्टी  रंगवून सांगणारा कोणतरी असतोच. खऱ्या खोट्याची शहानिशा नको म्हणून सहसा ही भूत दुसऱ्याला किंवा मित्राला दिसलेली असतात. रात्र चढत जाते  तशा या गोष्टी रंगत जातात. हळूहळू खूप दमलोय, उद्या ट्रेक करायचा आहे इत्यादी कारणे सांगून काही धीट (?) लोक झोपायला जातात. जे घाबरले नाहीत असं दाखवत असतात तेही हळूहळू शेकोटीच्या जवळ सरकतात किंवा जंगल आणि उघड्यावरचा भाग सोडून पाठीमागे मंदिर किंवा आडोसा असेल अशा जागी बसतात.

Bhangargh, Rajastan
बालेकिल्ला, भानगढ

 किल्ल्यावर रात्री  चालणाऱ्या भुतांच्या गोष्टी पुन्हा आठवण्याच कारण म्हणजे त्यावेळेस सरिस्का व्याघ्र प्रकल्पाला भेट देतांना आजुबाजूला कोणते  किल्ले पाहता येतील ते शोधत होतो.  त्यात भानगढ दिसला . भारतातला सगळ्यात जास्त "हॉंटेड" म्हणजेच "झपाटलेला" किल्ला. या किल्ल्याबद्दल जेवढं वाचायला लागलो , व्हिडिओज बघितले त्यात किल्ला कसा हॉंटेड आहे. अनेक लोकांना तिथे कसे अमानवीय शक्तीचे अनुभव आलेत यावरच भर देण्यात आला होता. किल्ल्याच्या इतिहासा बद्दल किंवा त्याच्या सद्यस्थिती बद्दल फ़ारच कमी माहिती होती.  त्यामुळे हा किल्ला प्रत्यक्ष जाऊन बघायण्यासाठी जयपुरहुन भानगढ गाठले.

जयपुर जवळील आमेर येथील कछवाह वंशाच्या राजा भगवंतदास (१५३७ - १५८९) यांनी भानगढ किल्ल्याची निर्मिती केली. राजा भगवंतदास मुघल सम्राट अकबराचे पंचहजारी मनसबदार होते. त्यांच्या पश्चात मुलांमधे वाटाण्या झाल्यावर मोठा भाऊ मानसिंह (अकबराच्या नवरत्नांतील एक) आमेरचा राजा बनले आणि धाकट्या माधोसिंहच्या वाटेला भानगढचा परिसर आला. त्यांनी या किल्ल्याला आपली राजधानी बनवली. भानगढ किल्ल्याची भरभराट झाली. किल्ल्यात आजही असलेल्या बाजारपेठेवरुन आणि किल्ल्यातील वास्तूंवरुन याची कल्पना येते. मग असा नांदता, भरभराटीला आलेला किल्ला अचानक ओस का पडला याचे कारण जनमानसात प्रचलित असलेल्या दंतकथां मध्ये सापडते.. 

Bhangargh Fort Rajasatan
टेहळणी चौकी (तांत्रिकाचा वाडा ? )

एका दंतकथे प्रमाणे आज भानगढ ज्या डोंगरावर आहे तेथे बाबा बालकनाथ नावाचे  एक तपस्वी साधू राहात होते.  किल्ला बांधण्यासाठी राजा त्यांचा आशिर्वाद आणि परवानगी मागण्यासाठी गेला. साधूने राजाला एका अटीवर किल्ला बांधण्याची परवानगी दिली ती म्हणजे , किल्ल्यावरील कुठल्याही वास्तूची सावली त्यांच्या कुटीवर पडता कमा नये. राजाने अट मान्य करुन भानगढ किल्ला बांधाला . पुढील काळात राजाचे वंशज साधूची अट विसरून राजमहालाची उंची वाढवत गेले.  त्याची सावली साधूच्या कुटीवर पडून अट मोडली . त्याक्षणी किल्ल्यात असलेल्या संपूर्ण शहराचा आणि पर्यायाने किल्ल्याचा विनाश झाला. साधूच्या शापामुळे ही जागा निर्जन झाली . किल्ला का ओस पडला याचे उत्तर या दंतकथेतून मिळत असले तरी , भानगढ किल्ला अघोरी शक्तीच्या सावटाखाली कसा आला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या दंतकथेत मिळतं. त्यानुसार सिंघा नावाचा एक वासनांध तांत्रिक होता. काही देणगी पदरी पाडून घेण्याच्या इराद्याने तो राजदरबारी गेला. तिथे त्याची नजर राणी रत्नावतीवर पडली. तिला बघून तांत्रिक वेडापिसा झाला आणि मग तिला मिळवण्यासाठी त्याने एक कारस्थान रचलं. मंत्राने भारलेली तेलाची कुपी त्याने राणीच्या दासीकडे दिली आणि निरोप पाठवला की हे तेल अंगास लावल्यास राणीला अलौकिक सौंदर्याचा लाभ होईल. दासी कुपी घेऊन राणीकडे गेली. तिने तांत्रिकाचा निरोप राणीला सांगितला.  कुपीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे मंत्र, तंत्र जाणणाऱ्या राणीला शंका आली. तिने ती कुपी एका अजस्र शिळेवर आपटली. कुपी फुटली. त्यातील तेल शिळेवर सांडलं तत्क्षणी शिळा घरंगळत खाली गेली आणि नेमकी झुडूपामागे लपून राणीला बघणाऱ्या तांत्रिकाच्या अंगावर पडली. शिळे खाली दबलेल्या तांत्रिकाने मरण्याआधी शाप दिला. 'संपूर्ण भानगढ़ नष्ट होईल आणि या परिसरात यापुढे कोणीही मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. असे म्हणतात की त्याचा शाप खरा ठरला आणि नंतर थोड्याच दिवसात किल्ल्यावर शत्रूने आक्रमण केलं. त्यात राजपरिवारातील मंडळीसह इथली सगळी रयत मारली गेली. एवढं होऊनही तांत्रिकाचा आत्मा मुक्त झाला नाही.  तो आजही किल्ल्यात भटक्त असतो आणी त्याला अटकाव करण्यासाठी राणी रत्नावतीचा आत्माही किल्ल्यात अजून आहे. 

जनमानसांत प्रचलित या दंतकथां पेक्षा इतिहास वेगळा आहे . माधो सिंहा नंतर त्याचा मुलगा छत्र सिंह भानगढचा राजा झाला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा अजब सिंह ( जवळच असलेला अजबगढ किल्ला यानेच बांधला) आणि त्यानंतर हरीसिंह भानगढचे राजे झाले. औरंगजेबाच्या काळात हरीसिंहाची दोन्ही मुले मुसलमान झाली. त्याच काळात किल्ल्यात मशिद आणि किल्ल्याबाहेर मकबरा बांधण्यात आला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता खिळखिळी झाली त्याचा फ़ायदा घेत महाराजा सवाई जयसिंहानी भानगढवर हल्ला करुन हरीसिंहाच्या दोम्ही मुलांना मारुन टाकले . युद्धात  भानगढची अपरिमित हानी झाली. राज्याची घडी विस्कटली, किल्ल्याचा राजधानीचा दर्जा गेल्याने व्यापार उदीम थंडावला , परिस्थिती हळूहळू खालावली. त्यात अठराव्या शतकात आलेल्या दुष्काळाची भर पडली. त्यामुळे किल्ल्यातील जनता हळूहळू जयपूर, अजबगढ. अलवार इत्यादी जवळपासच्या समृध्द राज्यात स्थलांतरीत झाली.

Haunted Bhangargh Fort
भानगढ किल्ला

आरवली पर्वताच्या पायथ्याला भानगढ किल्ला आहे. किल्ल्याला मागील बाजूने डोंगराचे संरक्षण आहे. भानगढ गावाच्या बाजूने किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी चार ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीत चार दरवाजे आहेत. लाहोरी (पोल) दरवाजा, हनुमान पोल (दरवाजा) ,  फ़ुलवारी पोल  आणि दिल्ली पोल. सध्या आपण हनुमान (पोल) दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरावरुन दरवाजाला हनुमान (पोल) दरवाजा हे नाव पडलेले आहे.  मुर्ती असलेले किल्ल्यातील हे एकमेव मंदिर आहे. तिथे आजही पूजाअर्चा चालते. किल्ल्यातील बाकीच्या चारही मंदिरात मुर्ती नाही. हनुमान गेट जवळ पूरातत्व खात्याचे कार्यालय आहे तिथून तिकिट घेऊन ( रोख रक्कम भरल्यास २५/- आणि ई पेमेंट केल्यास २०/- )  किल्ल्यात प्रवेश करता येतो.  येथे पूरातत्व खात्याने किल्ला बघण्याची वेळ सुर्योदय ते सुर्यास्त अशी लिहिलेली आहे . इतर ठिकाणी वेळ लिहिलेली असते पण याठिकाणी अशी पाटी का लावली असावी. किल्ला झपाटलेला आहे म्हणणार्‍यांचा पहिला मुद्दा हाच असतो. पूरातत्व खात्याने  किल्ला अतिशय सुंदर ठेवला आहे. परिसराची साफ़सफ़ाई , राखलेले गवत (लॉन), फ़ुलझाडं,  ठिकठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक हे प्रसन्न वातावरण पाहून पहिल्या नजरेत  हा किल्ला  झपाटलेला आहे हे पटत नाही. 

Bhangarh Fort
भानगढ

किल्ल्याची अधिक माहिती मिळावी आणि मला पडलेले काही प्रश्न विचारता यावेत यासाठी सोबत  गाईड घेतला,  पण किल्ला किती भुताटकीने भारलेला आहे हे सांगण्याच्या नादात त्याने कथांचे जे  चर्‍हाट सुरु केले ते एकट्या दुकट्या माणसाच्या मरणाच्या कथेपासून शेवटी शेवटी (आम्ही घाबरत नाही बघुन) एकाच वेळी हजारो माणस मरण्यापर्यंत प्रमाण त्याने वाढवत नेले. किल्ल्याचा इतिहास , वास्तू याबद्दल थोडक्यात सांगून तो जो भूतकथांमध्ये शिरला तो बाहेरच येईना. त्याची गाडी किल्ल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन पाहीला पण तो अयशस्वी झाला.  अशा कथांमुळे Dark tourism आणि  Ghost tourism, Haunted Tourism उगम होतो आणि चालना मिळते. अमेरीका आणि युरोपात अशा प्रकारच्या  Dark tourism ची परंपरा आहे. जुन्या किल्ल्यात आणि पूरातन वाड्यांमधे भूतकथा सांगत गाईड फ़िरवून आणतात. रात्र असली तरी त्याठिकाणी पध्दतशीरपणे लाईटस वगैरे लावलेले असतात. लोकांना काहीतरी वेगळ, रोमांचक (Exciting) म्हणून अशा टूर आवडतात. भानगढ पण त्याच्या भोवती निर्माण झालेल्या गुढ वलयामुळे Dark tourism च्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. इथे येणारे बहुतांश पर्यटक त्याच साठी ( घाबरवून घेण्यासाठी) आलेले असतात. भानगढ किल्ल्याला राजस्थानी लोकांनंतर , बंगाली लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात असे गाईडने आम्हाला सांगितले. काळ्या जादू (तांत्रिक) इत्यादी गोष्टींची तिथे परंपरा असल्यामुळे असेल कदाचित.  युरोपातल्या आणि भानगढच्या गाईडना  एकदा सह्याद्रीतील किल्ल्यावर नेऊन एक रात्र भूतकथा ऐकवायचा मोह आम्हाला झाला होता.

Bhangargh Fort , Rajasthan
Bhangarh Fort

किल्ल्यात शिरल्यावर किंबहूना भानगढ गावात शिरल्यावर सर्वात प्रथम किल्ल्याच्या डोंगरावर असलेली एक सुंदर वास्तू आपले लक्ष वेधून घेते. त्याचे स्थान आणि आकार बघता आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणार्‍या टेहळ्यांसाठी ती बांधली होती हे स्पष्ट्पणे कळते . पण गाईडच्या कथेतील तांत्रिक तिथे राहात होता, आजही त्याचा आत्मा तिथे राहातो आणि किल्ल्यातील भूताटकीच्या घटना घडवून आणतो . त्याला राणी रत्नावतीचा आत्मा अडवत का नाही ? असे विचारल्यावर गाईडने बाजारपेठ दाखवायला सुरुवात केली.  हनुमान दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूला एक मजली इमारती दिसतात. याला  'जौहरी बाजार.'  या नावाने ओळखतात. इथे आपल्याला रायगडाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अर्थात इथे दुकानांची/ पेढ्यांची संख्या जास्त आहे. बाजारपेठेच्या आकारमाना वरुन भानगढच्या एकेकाळच्या संपन्नतेचा आणि समृद्धतेचा सहजगत्या अंदाज बांधता येतो. सर्व दुकानांना तळ मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीने आहेत. या पेठेतील एकाच दुकानाची सुंदर कमान अजूनही शाबूत आहे. एकाही दुकानांचे छ्त मात्र शाबूत नाही आहे.  बाजारपेठेच्या मागच्या बाजूला व्यापार्‍यांचे वाडे आहेत. त्यात " मोडो की हवेली "  ही त्याकाळच्या बड्या व्यापार्‍याची हवेली आहे . 

Johari Market , Bhangargh
बाजारपेठ , भानगढ

दंतकथेतील साधूच्या शापामुळे भानगढ मध्ये मंदिरा व्यतिरिक्त कुठल्याही वास्तूंवर छत टिकत नाही असे गाईडने सांगितले. खरतर अठराव्या शतकात इंग्रजांनी किल्ले ताब्यात घेतल्या नंतर किल्ले ओस पडायला लागले . किल्ल्याना कोणी वाली राहीला नाही .त्यामुळे किल्ल्यावर राहाणार्‍या लोकांनी गावात घरे बांधण्यासाठी किल्ल्यातील वाड्यांचे वासे , दरवाजे  इत्यादी सामान वापरले . त्यामुळे महारष्ट्रातील किल्ल्यावरच्या वास्तू उघड्या बोकड्या बिन छताच्या पाहायला मिळतात. या उलट राजस्थानात इंग्रज आले त्यावेळी तिथले राजे संस्थानिक बनले त्यामुळे राजस्थानात बहुतांश किल्ले आजही व्यवस्थित राहीलेले पाहायला मिळतात. त्यामुळे तिथल्या लोकांना असे छत नसलेल्या उघड्या बोडक्या वास्तू पाहायची सवय नाही . भानगड मध्ये अशा बिन छताच्या वास्तूंना पाहून साधूच्या  दंतकथेचा उगम झाला असावा. 

तीन पोल आणि वड , भानगढ

बाजारपेठ जिथे संपते तिथे किल्ला आणि बाजारपेठ यांना वेगळे करण्यासाठी दुसरी तटबंदी आहे. याठिकाणी या तटबंदीत दरवाजा असावा . तटबंदीतून आत शिरल्यावर दुतर्फ़ा वास्तूंच्या अवशेषावर उगवलेली वडाची मोठमोठी झाड आहेत. वास्तूच्या भिंतीवर चढणारी मुळ आणि लोंबणार्‍या पारंब्या आणि साक्षात वडाचे झाड यामुळे इथे भूतांचे वास्तव्य असलेच पाहीजे. आमच्या गाईडने सुरुवात केली , सर आप जयपूरसे यहा तक आहे आपको रस्ते के बाजूमे एक भी ये पेड दिखा ? ये पिछे पहाडी है लेकीन उधर भी ये पेड नही है ,सिर्फ़ इधर ही क्यू ? मग त्याने "झाशी की रानी " या सिरियलची गोष्ट सांगितली त्याच्या शुटींगच्या वेळी कस इथे एका मुलीला भूत दिसल आणि तिला थेट जयपूरला नेऊन हॉस्पिटलमध्ये भरती कराव लागले इत्यादी. इत्यादी.  गाईड सांगत होता त्यातला अर्धा भाग खरा आहे. याभागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वडासारखी झाड तुरळक आहेत . मागच्या डोंगरावरही खुरटी झुडप दिसत होती . वडाची झाडे मोठ्या प्रमाणावर याच भागात होती. त्याच कारण म्हणजे बांधकामासाठी वापरलेला चुना. वड - पिंपळ इत्यादी झाडांना चुनखडी पोषक असते. त्यामुळे ती झाड आपल्याला कंपाऊंड वॉलवर , पडक्या वाड्यांवर रुजलेली आणि फ़ोफ़ावलेली दिसतात. त्यांचा आकार, दाट  सावली, लोंबणार्‍या पारंब्या, पानांची सळसळ ही भूतकथेसाठी योग्य वातावरण निर्मिती असल्यामुळे ही झाड भुतांशी जोडलेली आहेत. भानगढच्या भूतांसाठी ही वडांची झाड म्हणजे नंदनवनच.

Gopinath Temple , Bhangargh
Gopinath Temple Bhangargh


हे गाईडला समजवण्याच्या भानगडीत न पडता पुढे तिसर्‍या तटबंदीत असलेला तीन कमानीचा दरवाजा (तीन पोल) ओलांडून आत गेलो. येथे उजव्या बाजूला उंच जोत्यावर बांधलेले नागर शैलीतील गोपीनाथ मंदिर आहे. मंदिराच्या  भिंतींवर , खांबांवर,  छतांवर अप्रतिम कोरीव काम  केलेले आहे. मंदिरात मुर्ती मात्र नाही आहे. याठिकाणी "करण अर्जून" सिनेमातल्या एका प्रसंगाचे शुटींग झाल्य़ामुळे ते प्रसिध्द आहे.  याशिवाय किल्ल्यात सोमेश्वर मंदिर, गणेश मंदिर, मंगलादेवी मंदिर, केशवराय मंदिर ही मंदिर आहेत पण मंदिरात मुर्ती नाहीत. " त्यामुळे किल्ल्यातल्या भूतांवर देवाचा वचक नाही”, इती गाईड. "अरे, पण किल्ल्याच्या प्रवेशव्दारातच हनुमानाचे मंदिर आहे, हनुमान स्तोत्रात तो "’भूत प्रेत समंधादी ..." चा बंदोबस्त करतो असे म्हटले आहे. त्यावर अर्थात त्याच्याकडे उत्तर नव्हते.  याभागात लॉन , केवड्याची बाग इत्यादी लावून  परिसर सुंदर ठेवला होता.  एका वडाच्या झाडाखाली गणेश मंदिर मंदिर आहे. त्याच्या पुढे पुरोहिताच्या हवेलीचे अवशेष आणि आणि सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिरा जवळ पाण्याचा बांधीव कुंड आहे. किल्ल्यात मला आढळलेला हा एकमेव पाण्याचा स्त्रोत होता. 

कोरीवकाम , राजवाडा

Bhangarh Fort

हा परिसर पाहून चौथी तटबंदी ओलंडल्यावर वळणावळणाच्या, चढाच्या, फ़रसबंदी रस्त्याने आपण बालेकिल्ल्याचा बुलंद दरवाजापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्यात राजवाड्याचे अवशेष आहेत. त्याच्या दरवाजांवर आणि खिडक्यांवर कोरीवकाम केलेले आहे. याठिकाणी पाण्याचा कोरडा हौद होता. मागेच असलेल्या डोंगरातून पाणी आणण्यासाठी कुठलीही सोय केलेली इथे आढळली नाही. राजघराण्यातील लोक , त्यांच्या दास दासी . अधिकारी यांच्यासाठी खालून पाणी आणले जात होते असे गाईडने सांगितले. 


राजवाडा, भूत उतरवण्याची जागा 

राजवाड्याच्या खालच्या मजल्यावर छत असल्याने त्या खोल्या अंधार्‍या आहेत. कमानदार लांबलचक बोळ त्यांच्या टोकाशी असलेल्या खोल्या , त्यात वटवाघुळांचा वावर असल्यामुळे येणारा दर्प, पंखांच्या फ़डफ़डण्याचे आवाज यामुळे गुढ वातावरण निर्माण होते. त्यातल्या दोन खोल्यात नेऊन गाईडने तळघरात जाणारा जीना दाखवला आणि "यहा दस हजार के उपर लोक आज तक मरे है" अस सांगितले . एकावेळी एक माणुस आत जायची  मारामारी असलेल्या अरुंद जीन्याने तळघरात जाऊन तिथे "दस हजार लोग मरे है" म्हटल्यावर आम्हाला हसू आवरेना. राजवाड्याच्या सज्जातून किल्ल्याचा परिसर, टेहळणीची चौकी , मागचा डोंगर आणि भानगड गाव दिसत होते.

Bhangarh Fort
तळघर, भानगढ

 किल्ल्यात फ़िरायला येणारे पर्यटक इथे पर्यंत येतात आणि परत जातात . आम्हाला बाहेरच्या तटबंदीत असलेले तीन दरवाजे आणि दोन मंदिर पण पाहायची होती. त्यासाठी वेगळा चार्ज लागेल असे गाईडने सांगितल्यावर त्याचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी त्याने एक भूतकथा आम्हाला सांगितलीच. शुटिंगच्या युनिट बरोबर आलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार एकटाच तिथे गेला तो मेला त्याच्या भूताने तिथे नंतर गेलेल्या एका माणसाला पछाडल, तो म्हणायला लागला "मै शहारुख हू, मै सलमान हू" कारण काय तर, त्याची अभिनेता बनण्याची इच्छा अपूर्ण राहीली. मग त्याला राजवाड्यात आणण्यात आले . तिथे भूत उतरवल. आजही राजवाड्यात भूत उतरवल जात . त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ नका, असे निक्षुन सांगितले.

Bhangarh Fort
सोमनाथ मंदिर, भानगढ

सह्याद्रीत वेळी अवेळी फ़िरण्याची सवय असल्याने आम्ही केशवराय मंदिराकडे निघालो, पायवाट व्यवस्थित होती. आजूबाजूला गुढघ्या एवढी वाढलेली खुरटी झुडप होती. लख्ख उन पडलेल होत. त्यामुळे भूतांसाठी एकदम "अयोग्य" वातावरण होत.  हे मंदिरही नागरशैलीतील आहे. मंदिरात मुर्ती नव्हती. पुढे तटबंदीतल्या लाहोरी प्रवेशव्दाराजवळ पोहोचलो. त्या प्रवेशव्दाराच्या नावाचा आणि लाहोरचा संबंध नसून लोहाराशी संबंध आहे. याठिकाणी लोहारांची वस्ती असावी. उन खूप असल्याने एका झाडाखाली पाणी प्यायला बसलो. बाजूला एका वडाच्या झाडाखाली माकडांची एक टोळी बसली होती. अचानक त्यांच्या म्होरक्याने " खॅक " असा आवाज काढून इतरांना इशारा दिला आणि सगळी माकड सरसर झाडावर चढली.  त्याचवेळी राजवाड्यातून  झांजांचा आवाज आणि धूर यायला लागला . " माकडाला हजारो आत्म्यांपैकी एखादा आत्मा दिसला की काय ’? गाईडने सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम असेल आम्ही दोघे ताडकन जागेवरुन उठलो . उठल्यावर दिसले, झुडपातून एक कुत्रा तोंडात टिटवी घेऊन पळत आमच्या दिशेने येत होता. माकडाने ते आधीच पाहिल्यामुळे त्याने आपल्या कळपाला सावध केले होते. किल्ल्यात आल्या पासून अंगावर काही क्षणांपुरते रोमांच आणणारा हा एकच प्रसंग होता ....आणि तो ही भूतावीना. 

या जागा खरच झपाटलेल्या असतात की, आपल्याला आधीच मिळालेल्या माहितीमुळे आपणच झपाटलेलो असतो.

Bhangarh Fort
राजवाड्यातून भानगढ

फ़ुलवारी आणि दिल्ली पोल पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आलो , आमचा गाईड तिथेच बसला होता. त्याला झांजांच्या आवाजा बद्दल विचारल, तो म्हणाला काही वेळापूर्वी भूत उतरवण्यासाठी एकाला घेऊन लोक आली आहेत. त्यांचा आवाज आहे. किल्ला पूरातत्व खात्याच्या ताब्यात असताना, एवढे पहारेकरी व बंदोबस्त असताना किल्ल्यात भूत उतरवण्याचे प्रकार असे राजरोस पणे चालत असतील तर किल्ला भूताच्या विळख्यातून कधीच सुटणार नाही.

किल्ला फ़िरुन झाला होता. भूक लागली होती गावात हॉटेलची चौकशी करण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. तिथे काही बुजूर्ग लोक पण बसलेले होते. कुठून आलात वगैरे चौकशी झाली. मी भूताचा विषय न काढता त्यांना विचारल तुम्ही रात्री किल्ल्यात जाता का ? ते बोलले गावातल्या लोकांना जावच लागत. त्यांची गुर ढोर तिथे चरायला जातात एखाद चुकल आणि संध्याकाळी परत आल नाही तर काय, दुसर्‍या दिवशी पर्यंत वाट बघणार ? आम्ही रात्रीच जाऊन शोधून आणतो. हे उत्तर मिळाल्यावर अजून काही विचारण्याची गरज पडली नाही. 

सोमनाथ मंदिर, भानगढ
पाण्याचे कुंड, भानगढ

किल्ला पाहिल्यावर अस म्हणता येईल की ,तो ओस पडण्याचे एक कारण पाणी हे असू शकते. या भागात पाऊस तसाही कमीच पडतो. त्यात या किल्ल्यावर पाणी साठवण्यासाठी जागो जागी सोय केलेली मला तरी दिसली नाही. किल्ल्याच्या आत राहाणार्‍या लोकांना पाण्याचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्यांनी स्थलांतर केले असावे.  अकबरालाही त्याने वसवलेली नवीन राजधानी फ़त्तेपूर सिक्री ही पाण्याच्या तुटवड्यामुळे सोडून पुन्हा आग्र्य़ाला परतावे लागले होते. 

भानगढ किल्ल्याच्या भोवती असलेल्या भूतकथा सोडल्या तर किल्ला खरच सुंदर आणि एकदा तरी जाऊन पाहाण्यासारखा नक्कीच आहे.   


Bhangarh Fort , Rajasthan

जाण्यासाठी :- 

भानगढ किल्ल्यावर जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते भानगढ हे अंतर  ८५ किलोमीटर आहे.  याभागात  बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड - अजबगड - टेहलागड  - निळकंठ महादेव मंदिर - राजुरी फोर्ट हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

आम्ही हे सर्व पाहून दोन दिवस "सरीस्का व्याघ्र प्रकल्पा" जवळ मुक्काम केला होता. परतीच्या प्रवासात "विराट नगर"   (विराट नगरवर वेगळा ब्लॉग लवकरच येत आहे )  पाहून जयपुर गाठले होते .

Bhangarh Fort

Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

 

 https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी

 गेल्या वर्षापासून माझा उदयपूरला जाण्याचा प्लान चालू होता. शेवटी 2022 च्या दिवाळीच्या सुट्टीच्या आधी उदयपूरला जायचं नक्की झालं. बजेट ट्रीप नियोजन करायचे होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त स्थलदर्शन करता यावं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे कंजूस सरांचे मार्गदर्शन घेतलं. त्यांनी तत्परतेनं अतीशय उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या सल्याप्रमाणे माऊंट अबू या सहलीत समाविष्ट न करता माझ्या सहलीच्या नियोजनात काही बदलही केले. या सहलीचे नियोजन करताना ट्रिप ॲडव्हायझर आणि इतरही चॅनल वाल्यांचे व्लॉग कामी आले.आम्ही ट्रेनने जायचे ठरवले. स्लीपर कोचचे तिकीट साधारण रु.550/- प्रतिमाणशी आहे. सर्वांच्या सुटीच्या तारखा विचारात घेऊन BDTS उदयपूर Sf एक्सप्रेस चे स्लीपर चे बुकींग करुन टाकले.मुंबईवरुन उदयपूरला स्लीपर बसनेही जाता येते. तेवढेच तास लागतात. अगाऊ बुकींग केले तर रु.1000 च्या आसपास तिकीट आहे. तारीख जवळ असेल तर मात्र रु.2000-2500 दर होतात. हे मी मेक माय ट्रीप वर पाहिले.

      उदयपूरमध्ये 2 दिवसांनतर फारसे काही पाहण्यास नसल्याने आजुबाजुचा भाग फिरायचा ठरवला. सुरुवातीला एक दिवस एकलिंगजी, नाथद्वारा व हल्दीघाटी पाहायचे ठरवले होते. परंतु नाथाद्वाराला खूपच गर्दी असते. शिवाय पार्किंग स्पेस ही प्रत्यक्ष मंदिरापासून खूप लांब आहे (20 मिनिटे चालत). देवाची मूर्ती दर्शनासाठी अत्यंत कमी कालावधीसाठी खुली ठेवत असल्याने अतीगर्दी आणि खूप चेंगराचेंगरी वगैरे होते असे वाचनात आल्यानंतर तिथे जायचे कॅन्सल करून टाकले. त्याच वेळेला एकलिंगजी जवळील सास बहू मंदिर (सहस्र बाहू मंदिर) हे सुंदर मंदिर माझ्या पाहण्यात आले. त्यामुळे ते माझ्या स्थलदर्शनात समाविष्ट करून टाकले.

नकाशा/>

     खरंतर उदयपूर मध्ये सुरुवातीला चारच दिवसांचा प्लॅन केला होता. पण शनिवारी रात्री उदयपूर वरून मुंबईला येणारी कोणतीही थेट ट्रेन नसते. सबब 19 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर असा पाच दिवसांचा रविवार पर्यंत मुक्काम वाढवला. उदयपूर वरून निघणारी ट्रेन चित्तौडगड ला थांबत असल्याने दिवसभर चित्तोडगढ बघून रात्री उदयपूर वरून निघणारी ट्रेन चित्तोडगडला पकडायची असा बेत नक्की झाला. शेवटी 2 दिवस उदयपूर, एकदिवस – एकलिंगजी, नाथद्वारा, सह्स्रबाहु(सासबहु) मंदीर व हल्दीघाटी पाहायचे व एक दिवस कुंभलगड व राणकपूर पाहायचे व शेवटच्या दिवशी येता-येता चित्तौडगड पाहायचे असे 5 दिवसांचे नियोजन झाले.

सर्व स्थलदर्शनाचा नकाशा

नकाशा/>

      उदयपूरमध्ये काय पाहाल? –
खुद्द उदयपूर शहर पाहायचे झाले तर 2 दिवस पुरेसे आहेत. शहरातील प्रमुख आकर्षण पुढीलप्रमाणे –
नाव वेळ प्रवेश फी(प्रौढ) (मुले)
1) सिटी पॅलेस सकाळी 9.00 ते. 5.30 रु.२५० रु.१००
2) जगदीश मंदीर सकाळी 8.00 ते 9.30
3) लेक पिचोला बोट राईड सकाळी 9.30 ते 5.30 सकाळी रु.४०० व संध्याकाळी रु.८००, मुले सकाळी रु.२०० व संध्याकाळी रु.४००
4) बगोर की हवेली शो सकाळी 7.00 ते 8.30 ऑफलाईन रु.७५ ल ऑनलाईन रु.१०५
5) करणी माता मंदीर रोप वे सकाळी 9.00 ते.9.00 रु.९५
6) फतेह सागर लेक (मोती मगरी) सकाळी 9.00 ते 6.00 बोटींग साधी रु.७५ स्पीड बोट-२२०
7) सहेलियोंकी बाडी सकाळी 9.00 ते 7.00 रु.१०
8) सज्जनगढ (मॉन्सून) पॅलेस सकाळी 8.00 ते 6.00 रु.११०
9) विंटेज कार म्युजियम सकाळी 9.00 ते.9.00 रु.४०० रु. २००
10) बाहुबली हिल्स

     यातील अनु क्र.1-5 येथील स्थळे जवळजवळ असून एका दिवसात पाहता येतात. तर अनु क्र. 6-7 व 8 येथील स्थळे जवळजवळ आहे. त्यामुळे दोन दिवसात अनु क्र. 1-7/8 आरामात पाहू शकता. यातील विंटेज कार म्युजियम हे जुन्या कारचे खाजगी संग्रहालय आहे. त्यात आम्हाला स्वारस्य नसल्याने ते वगळले. सज्जनगढ व बाहुबली दोन्ही थोडे शहरापासून लांब आहेत. केवळ व्यू पॉईंट असल्याने व टॅक्सीनेच जावे लागत असल्याने खर्चाचा (दोन्ही स्थळांचा टॅक्सी खर्च अंदाजे रु.2500-3000 ) विचार करता ही स्थळे तेवढी आवश्यक वाटली नाहीत. सबब आम्ही तिथे गेलो नाही.

उदयपूर स्थलदर्शनाचा नकाशा-
नकाशा/>

     उदयपूरमध्ये रस्ते चिंचोळे आहेत. सतत ट्राफीक जाम असते. त्यामुळे शहर फिरण्यासाठी कारपेक्षा रिक्शा हा जास्त सोईचा पर्याय आहे. रिक्शाभाडेदर रु.100 पासून सुरु होतात. मिटर वगैरे काही नसतं. त्यामुळे एकेकटे ठिकाण पाहण्यापेक्षा दिवसभराची किंवा काही तासांची रिक्शा बुक केलेली परवडते. दिवसभराची रिक्शा 800-1000/- रु. मध्ये मिळते. उदयपूर सहलीत राहण्याचे ठिकाण शक्यतो लेक पिचोलाच्या जवळ असावे. जेणेकरुन तुम्ही सर्व ठिकाणे चालत कव्हर करु शकाल. जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आसपास रुम घेतली, तर प्रत्येकवेळी तुम्हाला रिक्षाने शहरात यावे लागते. जे अनावश्यक खर्च वाढवते. उपरोक्त अनु क्र.१-५ हि स्थळे लेक पिचोलाच्या जवळ चालत जाण्याच्या अंतरावर आहेत.

      मी महिनाभर आधीपासून हॉटेलचे बुकिंग करायचे बघत होते. आधी मी ॲगोडावरून एक हेरिटेज हवेली बुक केली होती. तथापि तिथे फोन केल्यानंतर कळाले की माझ्या 6 वर्षाच्या लहान मुलाचे ते एक्स्ट्रा चार्जेस ऐनवेळी आल्यावर घेणार होते. माझ्या बुकींगमध्ये तो फ्रीमध्ये राहू शकत असल्याचे नमुद होते. तथापि त्या हॉटेल मालकाने अतिरीक्त शुल्क भरावे लागेल असं सांगितले. त्यामुळे तिथे जायचं कॅन्सल करून टाकले व वेबसाईटवर तक्रार नोंद केली. नंतर Goibio वरून मी गजकर्ण हवेली ही लेक पिचोलाच्या काठी असलेली रूम मला बरीच स्वस्त मिळत होती. आणखीन एक दुसरे हॉस्टेल होतं त्याचेही रिव्ह्यू चांगलं होते. त्या दोघांचेही मी बुकिंग करून टाकले. गजकरण हवेलीला मी प्रत्यक्ष फोन करून विचारले त्यावेळी त्यांनी तीच रूम मला अन्य काही चार्जेस न भरता केवळ चौदाशे रुपये मध्ये दिली व कंपनीतर्फे बुकिंग न करण्याचे सुचवले. मी लेक पिचोलाच्या काठावर गजकर्ण हवेली हे लेक व्यू गेस्ट हाऊस बुक केले. जे मला नॉन एसी प्रतिदिन 1400/- रु. ला. पडले. 50% रक्कम आधीच भरून टाकली आणि माझ्या हॉटेलचे बुकिंग फिक्स करून टाकले. कुंभलगड व हल्दीघाटीला जाण्यासाठी ओळखीचा टॅक्सीवाला तुम्ही आल्यावर उपलब्ध करुन देतो असं हॉटेलमालकांनी सांगितल्यामुळे मी निर्धास्त झाले.

     आता सर्व तयारी झाली होती. कधी एकदा आम्ही उदयपूरला जाते असं मला झालं होतं. कारण स्वत: प्लान केलेली व लांबची अशी ही माझी पहिलीच सहल होती. शेवटी जायचा दिवस उजाडला. आम्ही रेल्वेने रात्री 11:25 वाजता बांद्रा टर्मिनस सोडले आणि उदयपूरच्या दिशेने प्रस्थान केले. इथे मला आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट वाटते ती म्हणजे ट्रेन अतिशय स्वच्छ होती. आम्ही सामान्य स्लीपर श्रेणीने प्रवास केला. परंतु कुठेही असुविधा जाणवली नाही. टॉयलेट स्वच्छ होते. कंपार्टमेंट वाखाणण्याजोगे स्वच्छ होते.प्रवास अतीशय सुखकर झाला. यात अजून एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्या इथे एरवी महाराष्ट्रात कुठे गेल्यानंतर रेल्वेच्या डब्यात खाण्यापिण्याचे विक्रेते सतत ओरडत येत असतात तसं कोणीही ट्रेनमध्ये आलं नाही. अगदी सकाळी नऊ-साडेनऊ वाजता रतलाम मध्ये ट्रेन थांबली त्याच वेळेला आम्हाला नाश्ता घेण्यासाठी खाली उतरावे लागले. ट्रेनमध्ये कोणीही नाश्ता घेऊन आलं नाही.

      रतलाम स्टेशनवर ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे थांबते तेवढ्या वेळात मी खाण्यापिण्याच्या बऱ्याच वस्तू विकत घेतल्या. त्यामुळे जे कोणी या ट्रेनने प्रवास करणार असतील त्यांनी थोड्या खाण्यापिण्याच्या तसेच कोरड्या खाद्यवस्तू सोबत ठेवलेल्या बऱ्या. आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे रतलाम स्टेशन वरती आम्ही घाईगडबडीत पोहे,ढोकळा आणि समोसा घेतला. पोहे अगदी अतिशय चविष्ट होते. पोह्यामध्ये कांदा नव्हता. पण पोह्याची स्वतःची अशी एक विशिष्ट चव होती.त्याच्यावर थोडीशी शेव आणि एक विशिष्ट जीरावन मसाला सारखा मसाला भुरभुरलेला होता. त्यामुळे पोहे अतीशय चविष्ट लागत होते. समोसा तर इतका खुसखुशीत व चविष्ट होता की त्याच्यासाठी कुठल्या चटणीची सुद्धा गरज नव्हती. ढोकळा ही बरा होता.त्यामुळे कधी रतलाम ला उतरलात तर हे पदार्थ ट्राय करायला हरकत नाही. त्यानंतर उदयपूर येईपर्यंत आम्ही काहीच खाल्ले नाही कारण 4-5 तासांत आम्ही उदयपूरला पोचणार होतो..........

भाग १उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी

     आमची ट्रेन दुपारी दोन वाजता पोचणार होती. जेवणाची वेळ होती. उदयपूर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर नटराज डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. येथे पारंपारिक राजस्थानी व गुजराती थाळी अडीचशे या दराने मिळते तिथे कायमच प्रचंड गर्दी असते . हॉटेलवर जाता जाता तिथे जेवावे की हॉटेलवर जेवावे याबद्दल माझे आणि मिस्टरांच्या बोलणे झाले. तेव्हा आधी रूमवर जाऊन फ्रेश होऊन तिथेच काय असेल ते जेवण जेवायचे, असा निर्णय आम्ही घेतला. ट्रेनमध्येच हॉटेल मालकाला फोन लावून जेवणाच्या व्यवस्थेबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या इथे प्युअर व्हेज जेवण आणि नाश्ता ऑर्डर प्रमाणे तयार करून देण्यात येईल असे सांगितले. त्यांचे रुफटॉप रेस्टॉरंट होते त्यामुळे त्यांना दोन व्हेज थाळीची ऑर्डर मी दिली. ट्रेन वेळेत पोहोचली. रिक्षाने आम्ही हॉटेलवर पोहोचलो. इथल्या रिक्षा ऐसपैस असतात व मागे सामान ठेवण्यासाठी जागा असते. आम्हाला हॉटेल सापडण्यासाठी फारशी अडचण आली नाही .
मी आत गेले त्यावेळी गेस्ट हाऊस बद्दल माझे फारसे काही चांगले मत झाले नाही. आपला निर्णय चुकला की काय असे मला वाटून गेले .तथापि ज्यावेळी आम्ही तिथे आत मध्ये गेलो आणि रूम्स बघितल्या तेव्हा मात्र बरे वाटले आणि आपला निर्णय योग्यच होता याची खात्रीही पटली. हॉटेल आतून मात्र छान होते. ही जुनी हवेली आता हॉटेलमध्ये रुपांतरीत केली होती. रुम अतिशय स्वच्छ, ऐसपैस होती. एक मोठा लार्ज किंग साईज बेड आणि बाजूलाच तळ्याकाठच्या भिंतीकडे एक छोटा सिंगल बेड होता. शिवाय छोटेसे डायनिंग टेबल, दोन टेबलड्रॉवर व डबल कपाट अशी सुटसुटीत खोली त्यांनी आम्हाला दिली होती. खोलीच्या खिडकीतून दिसणारे लेक पिचोलाचे दृश्य अतिशय नेत्र दीपक आणि मनमोहक होते.

रुमचे फोटो

रुमच्या खिडकीमधून दिसणारे दृष्य/>

रुम फोटो 1
रुम फोटो 1/>

रुम फोटो 2
रुम फोटो 2
रुम फोटो 3
रुम फोटो 3/>

      खिडकी उघडल्या उघडल्या बाहेर तळेच होते. थोडक्यात तळ्याच्या काठावर असणारी ही रूम होती. खोली आम्हाला प्रचंड आवडली. चेक-इनचे सोपस्कार पार पाडून आम्ही आमचे सामान खोलीमध्ये लावून घेतले. पटकन आंघोळी केल्या आणि आवरून साधारण तासाभरात आम्ही हॉटेलच्या गच्चीवर पोहोचलो. तिथूनदेखील तळ्याचे सुंदर नयनरम्य असे दृश्य दिसत होते. प्रचंड भूक लागलेली असल्याने आम्ही प्रथम जेवणाचा आस्वाद घेतला. बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, गरम गरम चपात्या, गुलाबजाम ,मसाला पापड व जीरा राईस असा साधा परंतु रुचकर बेत होता. मस्त तळ्याच्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही जेवलो. फोटोग्राफी करण्यात आणि हॉटेल मालकाशी बोलत बसण्यामध्ये थोडा वेळ गेला.

जेवणाचे फोटो
जेवणाचा फोटो />

     ट्रेन उशीरा पोहोचत असल्यामुळे मी आज फारसा काही बेत ठेवला नव्हता. आज फक्त बगोर की हवेलीमध्ये पारंपरीक कार्यक्रम पहायचा असे ठरवले होते. हा राजस्थानी पारंपरीक लोककलेचा प्रेक्षणीय कार्यक्रम दररोज सायंकाळी 7.00 ते 8.00 वाजता असतो. तिकीट ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध आहेत. ऑनलाईन तिकीटे https://dharoharfolkdance.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मी ऑनलाईन बुक केले. कारण मर्यादित तिकीटे असतात व लवकर संपतात. जर जास्त प्रेक्षक असतील तर रात्री 8.00 ते 9.00 असा अतिरीक्त शो ठेवतात पण ते काही निश्चित नसते.
आता सहा वाजत आले होते. त्यामुळे आम्ही बगोर की हवेलीकडे जाण्याचे ठरवले. बगोर की हवेली हे गणगौर घाटाच्या जवळच असलेली एक जुनी हवेली आहे. इथे काही पारंपरिक जुन्या काळातली शस्त्रे, वस्तु वगैरे असे संग्रहालय पण आहे. हे संग्रहालय सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडे असते. पन्नास रुपये तिकीट दर आहे. तथापि सिटी पॅलेस जर बघायचं असेल तर हे म्युझियम टाळले तरी चालते असे मी एका रिव्ह्यूमध्ये वाचले होते. परंतु येथे संध्याकाळी होणारा पारंपारिक कार्यक्रम पाहणे ही मात्र डोळ्यांसाठी आणि मनासाठी एक पर्वणी आहे. श्री व श्रीमती दीक्षित गेल्या 17 वर्षापासून हा कार्यक्रम येथे सादर करत आहेत. तिकीट दर अत्यंत नाममात्र आहेत, असेच मी म्हणेन. येथे कलाकार ज्या दर्जाची कला सादर करतात, ते पाहिल्यानंतर त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.
उत्तर राजस्थान, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, दक्षिण राजस्थान व मध्य राजस्थान या सर्व प्रदेशातील पारंपारिक लोककलांवर आधारित नृत्यप्रकार, गायन, पपेट शो असा हा कार्यक्रम आहे. साधारण एक तास चालतो. इथे भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर काम चालते. त्यामुळे लवकर जाऊन शक्यतो पुढच्या जागांवरती बसले तर कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पाहता येतो.

बैठक व्यवस्था 1
बैठक व्यवस्था/>

बैठक व्यवस्था 2
बैठक व्यवस्था 2/>

     आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते तरीही भली मोठी रांग होती आणि आम्हाला बरेच मागे थांबावे लागले. साधारण साडे सहा च्या दरम्यान त्यांनी प्रेक्षकांना आत सोडण्यास सुरुवात केली. शुटींग/फोटो करीता आपल्याला कॅमेरा (मोबाईलचा असला तरी) वापरायचा असेल तर शंभर रुपये अतिरिक्त भरावे लागतात. आम्हाला चांगली जागा मिळाली. साधारण 7.00 वाजता वेळेत कार्यक्रम सुरू झाला. ‘केसरीया.....बालमा.....पधारो म्हारे देस.....’ या अवीट गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम इतका सुंदर असतो की कलेची आवड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सुद्धा दाद दिल्याशिवाय राहवणार नाही. माझ्या नवऱ्याला अशा कार्यक्रमांमध्ये फारसा रस नाही. मुलगाही तसा लहानच आहे. तथापि दोघेही अक्षरश:स्तिमित होऊन त्या कलाकारांचे सादरीकरण बघत होते. डोक्यावर खूप सारे हांडे घेऊन नाचणाऱ्या स्त्रिया, हंड्यामध्ये आग असतानाही नाचणाऱ्या स्त्रिया, काचांवरती नृत्य करणाऱ्या, ताटली वरती नृत्य करणाऱ्या स्त्रिया, गणगौरीचा-महिषासुरु मर्दिनीचे परंपरागत नृत्य करणारे पुरुष..... ते बघून सर्वचजण टाळ्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन व दाद देत राहिले व कार्यक्रम उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत गेला.

काही फोटो.....
/>

क्र.1
फोटो क्र.1/>

क्र.2
फोटो क्र.2
/>

     एक गंमतीची गोष्ट म्हणजे या गणगौरीच्या नृत्यात महिषासुर व गौरीच्या संवादात ते दोघे ज्या चालीत एकमेकांना हाळी मारतात ती चाल म्हणजे जीवा-शीवाची बैलजोड........जाई बीगीनं आपली पुढं......या गाण्याची जी चाल आहे तीच आहे. हे सादरीकरण परंपरागत असून विशिष्ट जातीतील पुरुष पिढ्यानपिढ्या परंपरेने पुढे सादर करत आले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आम्ही अतीव समाधानाने तिथून उठलो . आम्ही तिथल्या सर्व कलाकारांनी पर्सनली जाऊन भेटलो व त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत फोटो हि काढले. आजचा दिवस सार्थकी लागला असंच वाटलं आम्हाला. त्यामुळे उदयपूर फिरायला जाणाऱ्यांनी हा कार्यक्रम चुकवू नये असे आग्रहाने सांगेन.

     साधारण आठच्या सुमारास बाजूलाच असलेल्या गणगौर घाटावरती पोहोचलो. लेक पिचोलाच्या काठावरती असे बरेच घाट आहेत. जसे की आमराई घाट, गणगौर घाट हे त्यापैकी काही प्रसिद्ध घाट आहेत. या काठावरती आजूबाजूचे दृश्य बघत आपण तासंतास बसू शकतो. कारण संध्याकाळी लेक पिचोलाच्या काठावर असलेल्या सर्व हवेलींमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई होते आणि हे दृश्य इतके सुंदर असते की आपण नुसते पाहत राहतो. जवळच असलेल्या साई कॉफी शॉप मधून आम्ही कोल्ड कॉफी घेतली आणि त्याचा आस्वाद घेत आम्ही घाटावरती साधारण तासभर बसलो. फोटो काढले.

काही फोटो....
/>

बगोर की हवेली
बगोर की हवेली/>

गणगौर घाट
गणगौर घाट/>

तळ्याकाठची रोषणाई
तळ्याकाठची रोषणाई/>

कोल्ड कॉफी
कोल्ड कॉफी
/>

      रात्री नऊच्या सुमारास आम्ही रूमवर परत आलो. जेवण उशिरा झालेले असल्यामुळे आता जेवायची इच्छा नव्हती. उद्या आम्हाला सिटी पॅलेस बघायला जायचं होतं त्यामुळे लवकर उठायचे होते. हॉटेल मालकाला नाश्त्याची ऑर्डर देऊन ठेवली आणि आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
दुसरे दिवशी सकाळी आम्ही उठून 8 वाजेपर्यंत आवरले. छोटूने रुममध्ये गरमागरम पोहे, आलू पराठा,दही,आचार व चहा असा अतीशय रुचकर नाश्ता आणून दिला. रुममधल्या डायनिंग टेबलच्या खिडकिमधून समोरचे तळे व पॅलेसचे मस्त दृश्य दिसत होते. पोटभर नाश्ता करुन आम्ही सकाळी 9 च्या दरम्यान स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो. इथे सांगण्याची गोष्ट म्हणजे सिटी पॅलेस परिसरात नाश्त्याचे ऑप्शन कमी आहेत. पोहे,उपमा, पराठा,मॅगी व सॅंडविच एवढेच पर्याय कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असतात. दुकाने कळकट्ट आहेत. आम्हाला सकाळी सकाळी समोसा/कचोरी खावीशी वाटत नाही व एकंदरीत तिथली दुकाने पाहून आम्ही थांबलेल्या हॉटेलवरच नाश्ता करणे पसंत केले.

/>

नाश्त्याचा फोटो
/>

नाश्त्याचा फोटो
/>

     आज आम्हाला जगदीश मंदिर, सिटी पॅलेस, लेक पिचोलाची बोट राईड व करणी माता मंदिर ला रोप वे ने जायचे होते. करणी माता मंदिरच्या रोप वे मधून सायंकाळच्या वेळी सिटीचे मनमोहक दृश्य दिसत असल्याने आम्ही सूर्यास्ताच्या दरम्यान तिथे जायचे ठरवले होते.
आम्ही हॉटेलमधून चालत 5 मनिटात जगदीश मंदिरात पोहोचलो. इथल्या छोट्या छोटया गल्ल्यांमधून चालत फिरणे हा एक सुखद अनुभव आहे.जगदीश मंदिरात प्रवेश फी नाही. हे भगवान कृष्णाचे मंदिर आहे. इथे मुख्य मंदिरात मूर्तीचे फोटो घेण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथला फोटो घेतला नाही. परंतू मंदिरावर अतीशय सुंदर कोरीव काम व नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. हे सर्व पाहण्यात 1 ते 1.5 तास सहज जातो.

काही फोटो –/>

/>

फोटो क्र.1
फोटो क्र.1
/>

फोटो क्र.2
फोटो क्र.2
/>

फोटो क्र.3
फोटो क्र.3
/>

फोटो क्र.4
फोटो क्र.4
/>

फोटो क्र.5
फोटो क्र.5
/>

     मंदीर पाहून मन अतिशय प्रसन्न झाले. इथून आम्ही सिटी पॅलेसकडे निघालो. सिटी पॅलेस इथून चालत 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याचा वृत्तांत पुढील भागात........

 करणी माता मंदिर चे रोपवे ची तिकिटे हि दूध तलाईच्या इथे खालीच मिळतात. साजन बाग कुठे आहे ते काही मला माहित नाही.

@सौंदाळा खरंच प्रवासामध्ये असे सुखद धक्के मिळाले की प्रवास हा अविस्मरणीय होतो. जगदीश मंदिर हे साधारण 1621 साली कधीतरी बांधले गेले.

जगदीश मंदिर भव्य आणि देखणे आहे. गजथर, अश्वथर, नरथर, देवथर स्पष्ट आहेत. नागर शैलीतले मंदिर सुरेख आणो मूर्तीही अगदी देखण्या आहेत.

मंदीर खरंच भव्य व देखणे आहे. मंदीराच्या अगदी समोर उंचीवर गरुडाची भव्य व सुंदर मूर्ती आहे. परंतू त्याचा फोटो काढण्यास मनाई होती. मंदीराचा मेंन्टेनन्स चांगला आहे. देऊळ साधारण ६०० वर्षे जुने असले तरी येथे तोडफोड काही झालेली दिसून येत नाही. जी इतरत्र अनेक ठिकाणी पाहिली.

   जगदीश मंदिर पासून सिटी पॅलेस पाच ते सात मिनिटाच्या चालत अंतरावरती आहे. इथे सिटी पॅलेसच्या बाहेरच अनेक राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने आहेत. जसे कपडे, टोप्या, गॉगल, दगडी वस्तू इत्यादी. पॅलेसच्या बाहेरच डाव्या हाताला तिकीट खिडकी आहे. या तिकीट खिडकीच्या आजूबाजूलाच गाईड उपलब्ध असतात. हे गाईड रजिस्टर असतात व गळ्यात त्यांचे आयडी कार्ड घालूनच फिरत असतात. पूर्ण पॅलेस फिरवायचे हे गाईड साधारण पाचशे रुपये घेतात. श्रीयुत सिंग यांना रु.500 या दराने गाईड म्हणून ठरवले. इथे एक आग्रहाने नमूद करावेसे वाटते की, सिटी पॅलेस पहायचा आहे तर गाईड अवश्य घ्या . गाईड शिवाय सिटी पॅलेस पाहणे म्हणजे केवळ टाईमपास आहे. गाईड तुम्हाला प्रत्येक गोष्टी मागील माहिती व कहाण्या सांगत असतात. गाईडमुळे सिटी पॅलेस पाहणे एक अर्थपूर्ण अनुभव होऊन जाईल. पूर्ण सिटी पॅलेस फिरून झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे दिल्याचे समाधान नक्की मिळेल. पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या सिटी पॅलेसचे व्यवस्थापन हे तिथल्या महाराजांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत पाहिले जाते. येथे बसण्यासाठी जागोजागी बैठक व्यवस्था, प्रसाधनगृह तसेच पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे कुठेही गैरसोय होत नाही. संपूर्ण पॅलेस फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तासांचा अवधी पाहिजे .आम्हाला पाच तास लागले. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सिटी पॅलेस पाहणार असाल त्या दिवशी केवळ सिटी पॅलेस व लेक पिचोलाची बोटिंग राईड एवढाच कार्यक्रम निवांतपणे कव्हर होऊ शकतो.

     सिटी पॅलेस मध्ये बोटिंग चा सुद्धा पॉईंट आहे. हा खाजगी बोटिंग पॉईंट असून इथून जाणाऱ्या बोटी या लेक पीचोलाची सफर घडवतात. जाताना तुम्हाला जगमंदिर वरती थोडावेळ थांबवले जाते. जगमंदिर हे लेक पिचोलाच्या मधोमध असणाऱ्या बेटांपैकी एक असून तेथे आधी राजाचा महाल होता. परंतु आता हा महाल एका फाईव्ह स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. तिथे छोटेसे म्युझियम देखील आहे. लेक पिचोलाच्या साधारण एका तासाच्या बोटिंगराईड मध्ये तुम्हाला या जगमंदिर येथे थोडा वेळ थांबवण्यात येते. तिथे तुम्ही काही खाऊ पिऊ पण शकता. परंतु दर अतिशय जास्त आहेत. हा पूर्णपणे फोटो पॉईंट आहे. एका फेरीसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत साधारण प्रतिमाणशी 400 रुपये दर आकारला जातो. तर संध्याकाळच्या वेळी अतिशय गर्दी असल्यामुळे प्रतिमाणशी 800 रुपये असा दर आकारला जातो. तुम्हाला जर सिटी पॅलेस मधून लेक पिचोलाची बोटिंग सफर करायची असेल तर त्याचे तिकीट तुम्हाला सिटी पॅलेसच्या तिकीट खिडकीवरतीच घ्यावे लागते.

      लेक पिचोला बोटींगचा दुसरा स्वस्त पर्याय म्हणजे सरकारी बोटिंग राईड. याचे तिकीट काउंटर दूध दलाई इथे आहे. इथे प्रतिमाणशी दर केवळ 175 रुपये आहे यामध्ये साधारण एक तास तुम्हाला लेक पिचोलाची सफर घडवली जाते. जगमंदिरच्या बाहेरून तुम्हाला फिरवले जाते व सर्व घाटांच्या वरती असणाऱ्या हवेल्यांचे मस्त दृश्य दिसते. त्यामुळे ज्यांना जग मंदिर वरती उतरण्यात काही इंटरेस्ट नाही त्यांनी सरळ सरकारमान्य बोटिंग मधून सफर करणे कधीही चांगले. तरीही शक्यतो संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जर बोटिंग केली तर लेक पिचोला वरील दिसणारी दृश्य ही खूप छान असतात असे ऐकले आहे.

     आता सिटी पॅलेस विषयी थोडेसे. सिटी पॅलेस हा 1553 झाली महाराज उदयसिंग द्वितीय यांनी बांधावयास घेतला आणि तो पूर्ण व्हायला सुमारे 400 वर्षे लागली. महाराज उदयसिंग द्वितीय यांच्या वारसदारांनी या बांधकामामध्ये भर घालत घालत आज जो आपल्याला राजवाडा दिसत आहे तो दिसतो. सिटी पॅलेसचा फक्त काहीच भाग हा लोकांसाठी खुला आहे. तर आतील इमारतीमध्ये राजाचे वंशज अजूनही राहत असतात. राजस्थान मधील लोकांमध्ये या राजांबद्दल अपार कृतज्ञता त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत दिसून येते. हे राजे अत्यंत दयाळू आहेत. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा बराचसा भाग हा लोक कल्याणासाठी दान केलेला आहे असे आमच्या गाईडने सांगितले. पूर्वी 12 वर्षातून एक दिवस हा संपत्तीचा दान करण्यासाठी ठरवला असे. परंतु राजाचे वंशज आता दरवर्षी संपत्ती दान करतात व बरेच लोकोपयोगी व लोक कल्याणासाठी ते आपला निधी, जमीन व संपत्ती देत असतात, असे आम्हाला गाईडने सांगितले.

      चला तर मग मी तुम्हाला माझ्या नजरेतून सिटी पॅलेसची सफर घडवून आणते...!!!

     सिटी पॅलेसचा भव्य दरवाजा या दरवाजाची उंची अशी आहे की त्यातून हत्ती सहजपणे आत बाहेर येऊ जाऊ शकेल.
दरवाजा

     ही महाराणा प्रताप यांची(मेवाड राजवंशाची) राजमुद्रा आहे.
राजमुद्रा

      यामध्ये भिल्लांची मुद्रा आहे. भिल्ल लोकांचे स्थान महाराणा प्रताप यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरिल्ला लढाई लढत असताना येथील अरवली पर्वतरांगांमध्ये राहणारे भिल्ल लोकांनी महाराणा प्रताप यांची अतिशय साथ दिली. व महाराणा प्रताप देखील त्यांच्याशी मनाने अतिशय जोडले गेले होते. त्यामुळे राज परिवारामध्ये आज देखील या लोकांना अतिशय मान दिला जातो. जेव्हा कधीही लग्नकार्य वगैरे असते तेव्हा त्यांना आग्रहाचे निमंत्रण असते व सन्मानित केले जाते असे गाईडने आम्हाला सांगितले. महाराणा प्रताप यांनी स्वतः वापरलेली शस्त्रे आहेत. फोटोत दिसणारी तलवार 35 किलो ची आहे असे गाईडने आम्हाला सांगितले.

     स्वत: महाराणा प्रताप यांनी वापरलेली शस्त्रे- तलवार, शिरस्त्राण,बाण इ.
फोटो 1
फोटो क्र.1

फोटो 2
फोटो क्र.2

फोटो 3
फोटो क्र.3

     जाळीदार दरवाजा यातून राजस्त्रीया बाहेरचे पाहू शकत
फोटो क्र.1

     प्रांगण
फोटो क्र.1

     पूर्वी कबुतरांच्या मार्फत संदेशवहन होत असे अशा कबुतरांचा पिंजरा
.

शिशमहल

फोटो 1
.

फोटो 2
.

     पेंटींग्जचे दालन- येथील पेंटींग्ज 300 वर्षापेक्षाही जास्त जूनी असून अशा प्रकारच्या चित्रशैलीला काही नाव होते ते मी विसरले. यातील रंग अस्सल असून खरे सोने व चांदी वापरली आहे त्यामुळे हे खूप टिकाऊ आहेत.

फोटो 1
.

फोटो 2 हल्दीघाटी युद्धाचा प्रसंग व इतर पेंटींग्ज
.

फोटो 3
.

फोटो 4
.

     पॅलेसच्या खिडकितून दिसणारे लेक पिचोलाच्या मध्यावर असणारे हॉटेल ताज
.

पॅलेसच्या खिडकितून दिसणार शहराचे व अरवली रांगांचे दृश्य-
.

रंगमहाल
फोटो 1
.

फोटो 2
.

सारीपाट खेळ
.

     या सज्जात बसून राण्या खालील प्रांगणात होणारे नृत्य इ. पाहत असत.
.

     ही त्याकाळात पॅलेसमध्ये असणारी लिफ्ट आहे.
.

     हे राजे सूर्यवंशी होते. पावसाळ्यात सूर्याचे दर्शन झाले नाही तर इथे पूजा करत असत.
.

     याच प्रांगणात घुमर इ. नृत्य केले जाते.
.

     राजाची जेवण्याची खोली
.

     स्वयंपाकाची भांडी

फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

     हेच ते राजप्रासादातील प्रांगण जिथे ईशा अंबानीचा साखरपुडा झाला होता.
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

     येथे प्राचीन काळातील भंग झालेल्या शिल्पांचे एक प्रदर्शन आहे
फोटो 1
.

फोटो 2
.

     आता चांदिच्या वस्तुंचे दालन सुरु होते –

      यात लग्नाचा मंडप,हुक्का,मुद्रीका,सिंहासन खेळणी, बुद्धीबळ, द्यूत, खलिते, पूजेच्या वस्तू इ. दिसून येतात.
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

फोटो 4
.

फोटो 5
.

फोटो 6
.

फोटो 7
.

फोटो 8
.

फोटो 9
.

फोटो 10
.

फोटो ११
.

     संपूर्ण पॅलेस बघून झाल्यानंतर पॅलेसच्या एंट्रन्स ला डाव्या हाताला सिटी पॅलेस मार्फत चालवली जाणारी काही दुकाने आहेत. ज्यामध्ये आम्हाला गाईडने नेले. इथे सीताफळाच्या धाग्यापासून, केळीच्या धाग्यांपासून, उसाच्या चिपाडापासून बनवली जाणारी साडी, रजाई अशा प्रकारच्या वस्तू आहेत. तसेच काही ज्वेलरी आयटम्स पण आहेत. येथील साड्या व ज्वेलरी काही काळानंतर वापरायची नसल्यास इथे परत पाठवली तर 50 टक्के रक्कम परत केली जाते. आम्हाला रजई,साडी व बांगड्या आवडल्या म्हणून आम्ही खरेदी केले.

     आता आमचा सिटी पॅलेस फिरून पूर्ण झाला होता. जेवणाचे काय करायचे याबद्दल आम्ही विचार करू लागलो. गाईडने आम्हाला सांगितले की इथेच पॅलेस च्या आत मध्येच एक रेस्टॉरंट आहे. तिथे दाल बाटी चुरमा मिळतो. तुम्हाला खायचे असेल तर इथे खा किंवा बाहेर पण चांगले रेस्टॉरंट्स आहेत. आम्ही असा विचार केला की सिटी पॅलेस मध्ये पारंपारिक पद्धतीने डाळ बाटी चुरमा आपल्याला मिळेल. त्यामुळे इथेच जेवायचे ठरवले. आम्ही अकरा वाजता इथे आलो होतो आता जवळपास चार वाजत आले होते इथल्या रेस्टॉरंट मध्ये रुपये 150 मध्ये डाळ बाटी चुरमाची थाळी मिळते. ती आम्ही घेतली. मी पहिल्यांदाच डाळ बाटी चुर्मा खात होते. चुरमा अतिशय चविष्ट लागला.परंतु डाळ काही इतकी ठीक वाटत नव्हती. फार काही ग्रेट वाटले नाही मला. मुलाला आणि नवऱ्याला मात्र चव आवडली.

थाळी –

.

     आता आम्हाला करणी माता मंदिर ला जायचे होते. त्यामुळे आम्ही रिक्षा केली. खरेदी केलेले सामान रूमवरती टाकले आणि आम्ही करणी माता मंदिर कडे प्रस्थान केले. सिटी पॅलेस पासून करणी माता मंदिर चे तिकीट काउंटर साधारण अडीच ते तीन किलोमीटर असेल. तिकीट काउंटर वर पोहोचलो. माणशी साधारण 115 रुपये असे तिकीट होते. तीन तिकीट घेऊन आम्ही रोपवेच्या स्टार्टिंग पॉइंटवर पोचलो. रोपवेने करणी माता मंदिर वर पोहोचायला साधारण पाच ते सात मिनिटे लागतात. खालून वरती जाताना संपूर्ण उदयपूर शहराचे विहंगम असे दृश्य दिसते. करणी माता मंदिर हे डोंगरावर आहे ,त्यामुळे डोंगरावरील हिरवाई आणि खाली तलावाकाठी वसलेले उदयपूर शहर हे दृश्य कितीही वेळा डोळ्यात साठवले तरी मन भरत नव्हते. येथील काही फोटो-

फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

      करणी माता येथे मंदिर येथे पोहोचल्यानंतर तिथून आजूबाजूला अनेक विहंगम दृश्य दिसत होते. रोपवेतून उतरल्यावर मंदीराकडे जाताना वाटेत आम्हाला राजस्थानी पारंपारिक वेशभूषा मध्ये फोटो काढून देणारे लोक भेटले. करणी माता मंदिर येथे आम्हाला साधारण एक तास तरी लागणार होता. त्यामुळे आम्ही येथे फोटो काढून घ्यायचे ठरवले. एका माणसाचा फोटो काढायचा असेल तर शंभर रुपये, दोन माणसांचा फोटो असेल तर २०० रुपये आणि एका फोटो तीन माणसे असतील तर तीनशे रुपये अशा पद्धतीचे त्यांचे चार्जेस होते. आम्ही त्या पारंपारिक वेशभूषेमध्ये अनेक फोटो काढले. काही सिलेक्ट केले आणि परत जाताना ते आम्हाला प्रिंट काढून देणार होते व सॉफ्ट कॉपी सुद्धा देणार होते.

मुलाचा फोटो
.

     करणी माता मंदिर हे नवसाला पावणाऱ्या देवीचे मंदिर आहे. देवीच्या गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी परवानगी नसल्यामुळे मी देवीचे फोटो काढले नाही. वीस पंचवीस मिनिटे आम्ही मंदिर परिसरात बसून होतो. बहुदा देवीच्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू होते. बरेच बांधकामाचे साहित्य आजूबाजूला पडले होते.

     मंदीर परिसर फोटो
फोटो 1
.

     आता आम्ही परत निघायचे ठरवले. संध्याकाळचे सहा वाजले होते. आम्हाला परत लेक पीचोला मध्ये बोटिंग करायचे होते. परंतु उतरत असतानाच आम्हाला एक मोठा सज्जासारखा भाग दिसला. जिथे बरेचसे बाकडे टाकले होते. काही खाद्यपदार्थांचे स्टॉल होते आणि बाजूलाच एक स्वच्छ असे प्रसाधन गृह पण होते. हा एक व्यू पॉईंट होता. इथून अगदी समोरून आम्हाला अरवली पर्वतरांगांमध्ये सूर्यास्त होताना दिसत होता.

     हे दृश्य मी वर्णन करू शकणार नाही इतके सुंदर होते!! समोर मला विस्तीर्ण असा उदयपूर शहराचा नजारा दिसत होता आणि मागे अरवली पर्वतरांगातून अस्ताला जाणारा सूर्य!! कितीही डोळ्यात साठवले तरी मन भरत नव्हते. इथे अनेक विदेशी पर्यटक बाकड्यावरती बसून सूर्यास्ताचा आस्वाद घेताना दिसत होते. इतक्या दिवसाच्या वाचनामध्ये या स्थळाबद्दल कोणताही उल्लेख मी वाचलेला नाही. परंतु उदयपूर सहलीतला मी पाहिलेले सर्वात अप्रतिम असे हे स्थळ होते. हा सूर्यास्त अजिबात चुकवला नाही पाहिजे असेच मी म्हणेन. इथे पाहिलेला सूर्यास्त हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सूर्यास्त पैकी एक होता. आम्ही तिथल्याच एका स्टॉल वरून मॅगी व मोजीतो घेतला आणि समोरच्याच बाकड्यावर बसून आम्ही सूर्यास्ताचा आस्वाद घेतला.

फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

फोटो 4
.

.

     साधारण अर्धा तासामध्ये सूर्यास्त झाला आणि आम्ही रोपवे मधून खाली उतरू लागलो. खाली उतरत असताना उदयपूर शहरांमध्ये झालेली रोषणाई दिसत होती. खाली उतरतानाचे दृश्य सुद्धा अप्रतिम होते. याचे काही फोटोज-

.

.

     खरोखर आजचा दिवस आणि करणी माता मंदिरातून पाहिलेला सूर्यास्त, यांनी आम्ही इतके खुश झालो होतो, की उदयपूर सहलीची इथेच सांगता झाली असती तरी चालले असते. इतके आमचे मन तृप्त झाले होते. गव्हर्मेंट बोटींग बंद झालेले होते. त्यामुळे आम्ही गणगौर घाटावरती जायचं ठरवले.

     आम्ही गणगौर घाटाकडे गेलो कारण तिथल्या वातावरणाच्या प्रेमातच आम्ही पडलो होतो. जवळपास तासभर आम्ही तिथे तळाच्या पाण्यामध्ये पाय सोडून बसलो. आता उद्याच्या दिवसाचे नियोजन आम्हाला करायचे होते. मी हॉटेलच्या मालकाला फोन लावून कुंभलगड हल्दीघाटी येथे जाण्यासाठी टॅक्सीबद्दल विचारले तर त्याने त्याचा जो ड्रायव्हर ठरवला होता त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तो येणार नाही असे कळवले.

     आता मात्र मला टेन्शन आले की आता कसं करायचं? शेवटी आम्ही दुपारी ज्या रिक्षावाल्याच्या रिक्षा मधून गेलो होतो, त्याला फोन लावला आणि त्याला विचारलं की बाबा तुझ्या ओळखीचा कोणी आहे का? तेव्हा त्याने त्याच्या गल्लीतच राहणाऱ्या एका माणसाचा नंबर दिला. त्या ड्रायवरने एकलिंगजी,नाथाद्वारा हल्दीघाटी आणि कुंभलगड हे एका दिवसात करू शकता आणि त्याचे त्यांनी 3200 रुपये वीथ टोल आणि पार्किंग असे सांगितले. मी त्याला सांगितले की उद्या फक्त एकलिंगजी,सासबहु मंदीर व हल्दीघाटी करायचे आहे. नाथाद्वाराला वेळ मिळाला तरच जायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला राणकपुर आणि कुंभलगड करायचं आहे. त्यावर त्याने सांगितले की दोन्ही दिवसाचे साधारण मिळून सात हजार रुपये भाडे होईल.

     मग मी जस्ट डायल आणि इतर ठिकाण फोन करून विचारले तर त्यांनी तर अजून जास्त रकमेची कोटेशन दिली. शेवटी मी विचार केला जर एका दिवसामध्ये कुंभलगड एकलिंगी हल्दीघाटी ही ठिकाणी कव्हर होत आहेत तर केवळ राणकपूरसाठी परत एक दिवस गाडी न करता जेव्हा माउंट आबुला जायचं आहे तेव्हा राणकपुर पाहता येईल. त्यामुळे मी पहिल्याच ड्रायव्हरला फोन करून सकाळी सात वाजता यायला सांगितले व तीन हजार दोनशे रुपये मध्ये दिवसभराची ट्रिप फिक्स करून टाकली. गणगौर घाटावरती 1 तास बसून आम्ही रूमवरती परत आलो. मोजीतो आणि मॅगी खाल्ली होती त्यामुळे भूक अशी काही नव्हती . आम्ही गेल्यानंतर पनीर चिली ऑर्डर केली आणि तेवढेच खाऊन आम्ही झोपी गेलो. उद्या आम्हाला सात वाजता तयार राहायचे होते, म्हणजेच किमान सहा वाजता तरी उठावे लागणार होते. त्यामुळे आम्ही लगेच झोपी गेलो. क्रमशः

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती तीसरा दिवस

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पहिला दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती दुसरा दिवस

     आज सहलीचा तीसरा दिवस होता. आम्ही आज सकाळी सात वाजता आवरून तयार झालो. ड्रायव्हर कार घेऊन तयार होता. गाडी अतिशय व्यवस्थित होती. आज आम्हाला कुंभलगड, हल्दीघाटी, एकलिंगजी आणि सहस्र बाहू मंदिर ही ठिकाणे पाहायचे होते.

     आता यात वेळेचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने एक माहिती सर्वांना असायला हवी म्हणून सांगते, की एकलिंगजी मंदिर सकाळी दहा नंतर भाविकांसाठी उघडते. इथे फोटोग्राफी वर बंदी आहे. एकलिंग जी मंदिराच्या अगदी जवळच काही अंतरावर सहस्त्रबाहू मंदिर (ज्याला स्थानिक सास-बहू मंदीर म्हणतात)आहे. हे मंदिर सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत उघडे असते. सहस्त्र बाहू मंदिर इथे लौकीकार्थाने कोणतीही देवाची मूर्ती नाही. तथापि हे मंदिराचे अवशेष आहेत. परंतु यावरती अत्यंत देखणे असे कोरीव काम आहे. सद्यस्थितीत हे स्थळ प्री-वेडिंग फोटोशूट साठी प्राधान्याने वापरले जाते. एकलिंगजी मंदिर हे देखील कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. तथापि यातील केवळ मुख्य मंदिराचा भाग हा भाविकांसाठी खुला आहे. अन्य मंदिरे व आजूबाजूच्या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. कुंभलगड हा किल्ला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये पर्यटकांसाठी खुला आहे.

      कुंभलगड येथे विकांताला व सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकीट खिडकी वरती बरीच रांग लागते. शिवाय तिकीट खिडकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी बरीच जागा असली तरी तेथे आधीच गाड्यांनी पार्किंग अडवले असल्यास तुम्हाला पार्किंगसाठी बरेच मागे यावे लागते आणि तिथून तिकीट खिडकीपर्यंत चालत जाणे हे बरेच मोठे अंतर ठरू शकते. त्यामुळे जेवढे लवकरात लवकर तुम्हाला कुंभलगडला जाऊन वाहन पार्क करणे शक्य होईल तेवढे करणे सोयीचे ठरते. कुंभलगड व चित्तोडगडचे तिकीट तुम्ही आधीच काढून ठेवू शकता. आम्ही हे ऑनलाईन बुकिंग आधीच केले होते. https://payumoney.com या संकेतस्थळावरती ऑनलाइन बुकिंगची सोय आहे. येथे जोधपूर हे शहर निवडावे लागते. जोधपूर हे शहर निवडल्यानंतर तेथे कुंभलगड आणि चित्तोडगढ या दोन्हीही किल्ल्यांचा किल्ल्यांचे ऑपशन तुम्हाला दिसतात. त्यातील कुंभलगड निवडल्यानंतर पुढे तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतात. जसे की तुम्ही इंडियन आहात, प्रौढ किती, मुले किती इ. प्रतिमाणशी 35 रुपये तिकीट आहे. मुलांकरता प्रवेश निशुल्क आहे.

     ड्रायव्हरने सांगितले की प्रथमतः कुंभलगड येथे जाऊया. तीन तास तरी लागतील. वास्तविक उदयपूर ते कुंभलगड हे अंतर 85 किलोमीटर आहे. परंतु रस्ता एकल आहे. मध्ये तर खूपच खराब आहे. चिंचोळा रस्ता असल्यामुळे समोरून एखादे वाहन आले तर अतिशय काळजीपूर्वक क्रॉस करावे लागते. त्यामुळे केवळ गुगल मॅप वरती दोन तासाचे अंतर दिसत आहे असे समजून प्रवासाचे नियोजन करू नये. उदयपूर-कुंभलगड या प्रवासाला आरामात तीन तास लागतात.

      कुंभलगड सलग चढायला साधारण अर्धा तास लागतो. रस्त्याचा चढ दगडी असून अत्यंत तीव्र आहे. दगडी मार्ग असला तरीही त्यातून चालत जाणे हे पायाचे दुखणे असलेल्या लोकांसाठी अत्यंत कठीण होऊ शकते. त्यामुळे शारिरीक दुखणे असलेल्या लोकांनी स्थलदर्शनात कुंभलगडचा समावेश विचारपूर्वक करावा. ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे आम्ही प्रथम कुंभलगडला जायचं ठरवले. तेथून पुढे हल्दीघाटी आणि त्यानंतर सर्वात शेवटी एकलिंगी व सहस्त्रबाहू मंदिर करायचे असे नियोजन ठरले. जाताना आम्ही गाडीतच नाष्टा करण्यासाठी पोहे पार्सल घेतले आणि आम्ही कुंभलगडकडे प्रस्थान केले.

     ड्रायव्हर अतिशय नम्र व सज्जन होता. ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की, या रस्त्यावरती जी काही गावे आहेत, तो सर्व एरिया साधारण आदिवासी समाजाचा आहे. हे लोक सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडतात आणि दुपारी आपली मजुरी घेऊन परत येतात. येताना दारू वगैरे पिऊन येतात. त्यामुळे दुपारी चार- पाच नंतर या ठिकाणी फिरणे अत्यंत धोकादायक आहे. इथे समोरून गाडी/दुचाकी आली तर पहिल्यांदा आपल्यालाच गाडी रस्त्याखाली घेऊन वाट करुन द्यावी लागते. याबाबतीत कोणताही वाद घालून चालत नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर या परिसरातून आपल्याला परत निघता येईल ते सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे आपण प्रथम कुंभलगडला जात आहोत.

     या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला वाटेत फार कमी तुरळक हॉटेल दिसली. दुकाने फारशी अशी नाहीत. पेट्रोल पंप सुद्धा फार कमी ठिकाणी दिसले. त्यामुळे सेल्फ ड्राईव्ह करणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती ध्यानात घ्यावी. उदयपूर ते कुंभलगड अशी बस सेवा आहे. परंतु त्याचे फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी आहे . आमच्या तीन तासाच्या प्रवासात मला केवळ एकच बस दिसली आणि त्या बसच्या टपावरती सुद्धा माणसे बसलेली दिसली. आम्ही ड्रायव्हरला विचारले की एवढी माणसे का भरतात? त्यावर ड्रायव्हरने उत्तर दिले की कोणत्याही गावांमध्ये हात दाखवला तर गाडी ही थांबवावीच लागते. नाहीतर ते लोक दगड मारून मारून गाडी फोडतात. . अशी बरीच रंजक माहिती आम्हाला प्रवासादरम्यान मिळत होती.

फोटो

.

.

     एक गोष्ट नक्की की, उदयपूर ते कुंभलगड हा प्रवास अत्यंत निसर्गरम्य असा आहे. माझ्या आयुष्यात केलेला हा एक अत्यंत अविस्मरणीय प्रवास म्हणावा लागेल. एका बाजूने अरवली पर्वत डोंगरांग ही तुमच्या सोबत सतत असते आणि उजव्या बाजूला बाणस नदी वाहत असते. हा भाग बघताना एकावेळी आपल्याला वाटतं की आपण हिमालयात आहोत का? एकावेळी वाटतं की आपण कोकणात आहोत का? अत्यंत घनदाट झाडी आजूबाजूला दिसत असते. किती पाहू आणि किती नको. मी खूप फोटो या प्रवासादरम्यान काढले आणि एक वेळ अशी आली की त्यानंतर फोटो काढणे बंद करून टाकले आणि डोळ्याने या निसर्गाचा आस्वाद घेत मी हा प्रवास पूर्ण केला.

     काही फोटो

.

.

      ही डोंगर रांग इतकी सुंदर आहे की ज्यांनी ती पाहिली आहे त्यांनाच कळू शकेल की त्याचे सौंदर्य अत्यंत वेगळ्या प्रकारचे आहे. ड्रायव्हरला मी विचारले की कधी मुंबईला तुमचे येणे जाणे होते का? त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की आमच्यासारखी माणसे मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात राहू शकत नाही. आम्ही अत्यंत निसर्गरम्य वातावरणात राहतो. हे पहाड नजरेस दिसली नाही तर मग आम्ही बेचैन होतो. आम्ही कधी बाहेर गेलो आणि हे पहाड दिसले नाहीत तर कधी एकदा परत जातो असे होते. ज्यावेळी आम्ही आमच्या शहरात येतो त्यावेळी मन थाऱ्यावर येते. पहाडी आहे तर सर्व आहे व आपण आहोत. हा सर्व निसर्ग टिकवला पाहिजे. हे पहाड असेच राहिले पाहिजे. आता कुंभलगड मध्ये सुद्धा तुम्ही बघाल तरी पहाड फोडून काहीजण ते रिसॉर्ट बनवत आहेत. पण हे योग्य नाही. त्यावर आम्ही विचारले की ही पहाडी आहे ती खाजगी मालकिची आहेत का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की बरेचसे वनविभागाचे आहेत पण काही ठिकाणी पूर्वापार लोक राहत आहेत ते त्यांच्याच मालकीचे आहेत. ते तिथे डोंगर फोडतात आणि रिसॉर्ट बनवतात. एका अल्पशिक्षित ड्रायव्हरचे इतके शहाण्यासारखे विचार ऐकून आम्ही विचारात पडलो.

     वाटेतच बाणस नदीचे एक अप्रतिम दृश्य दिसले. ड्रायव्हरनेच आम्हाला खास येथे गाडी थांबवत फोटो काढायला सांगितले. तो म्हणाला की मी माझ्या मुलांसोबत आणि मित्रांसमवेत इथे येत असतो . असं वाटत होतं की आपण कुठेतरी लेह-लदाखला आलो आहोत की काय! तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो खुदागवाह या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये या स्थळाचे शूटिंग आहे ते काहीतरी लेह लडाख या साईड कडचा सीन म्हणून इथे चित्रित झालेला आहे. मी काही तो सिनेमा पाहिलेला नाही. ज्यांनी पाहिला असेल त्यांना कदाचित कळेल.

     फोटो

.

.

.

      वाटेत ठिकठिकाणी थांबत निसर्गाचा आस्वाद घेत व तिथे फोटो काढत आम्ही रमत गमत कुंभलगडला पोहोचलो, त्यावेळी दहा वाजून गेले होते.

     फोटो

.

.

.

.

     तिकीट काढलेले असल्यामुळे आम्ही थेट प्रवेशद्वारापाशी गेलो. तिथे ऑनलाईन तिकीट चेक करून आम्हाला आज सोडले गेले. ड्रायव्हरला तिथेच गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळाली आणि आम्ही कुंभलगड मध्ये प्रवेश केला.

.

.

.

      कुंभलगडचे विशेष म्हणजे दुरून हा गड दिसत नाही. साधारण गडाच्या जवळ पाचशे मीटरच्या अंतरावरती गेल्यानंतरच हा गड दिसतो. लांबून कुठूनही पाहिले तरी इथे कोणता किल्ला आहे हे शत्रूला दिसू नये त्या अनुषंगाने याची अशी ही अद्भुत रचना केलेली आहे. हा गड गाईड शिवाय पाहु नये. येथे रजिस्टर गाईड फार कमी दिसले. इथे केवळ सरकारी गाईंना परवानगी आहे त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन्स फार कमी राहतात. आम्ही गेलो त्यावेळी तिथे केवळ तीनच सरकारी गाईड होते. त्यांनी आम्हाला साडेसातशे रुपये फी सांगितली. शेवटी आम्ही तिथेही एक गाईड 750 रुपयांना ठरवला. गाईड घेतल्याचा दुसरा फायदा म्हणजे गाईड प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत, एखाद्या ठिकाणची माहिती सांगत सांगत आपल्याला वरपर्यंत नेतात. त्यामुळे आपण गड चढताना पायावर जास्ती ताण येत नाही. तरीदेखील आम्ही वाटेत थांबत थांबतच गड चढलो.

.

     आता गडाविषयी थोडेसे. खरंतर मूळात सहाव्या शतकामध्ये मौर्य साम्राज्यातल्या राजाने इथे गड बांधला होता असे समजले जाते. परंतू आत्ताचा जो कुंभलगडचा किल्ला बांधलेला आहे तो पंधराव्या शतकात राणा कुंभा यांनी बांधला आहे. हा इतर किल्यांसारखा मानवी वस्तीचा किल्ला नाही. हा केवळ लढाई करण्याच्या अनुषंगाने बांधलेला किल्ला आहे. मंदिराच्या किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये 360 मंदिरे आहेत. त्यातील 300 ही जैन मंदिर आहेत आणि इतर हिंदू मंदिर आहे. . राणा कुंभा हे आठ फूट उंचीचे होते. मंदिरातील शिवलिंग हे चार फूट उंचीचे आहे. राणा कुंभा मांडी घालून बसल्यावर बिल्व पत्र वाहताना समोरील शिवलिंगाची उंची ही कमी असावी अशा पद्धतीने त्यांनी शिवलिंग स्थापन केले आहे. आता बऱ्याचशा मंदिरांमधल्या मूर्तींचा भंग झाल्यामुळे यातील कोणत्याही मंदिरामध्ये पूजा केली जात नाही. फक्त केवळ एक शिवमंदिर आहेत तिथे आज देखील पूजा केली जाते असे कळले.

.

     या किल्ल्याचे जे वास्तू रचनाकार होते त्यांचे नाव श्री.मंडन असे होते. ज्या वेळेला या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी सकाळी बांधलेले बांधकाम रात्रीपर्यंत पडून जात असे. असे का होते हे तिथल्या एका साधू पुरुषास विचारले गेले .त्या साधू पुरुषांनी असे सांगितले की इथे मूळ देवीचे स्थान आहे आणि तिला स्वतःहून इच्छुक असलेल्या माणसाचा बळी दिल्याशिवाय इथले बांधकाम पूर्ण होणार नाही. राजाने राज्यात दवंडी पेटवली की असा कोणी माणूस स्वेच्छेने स्वतःचा बळी देण्यास इच्छुक आहे का? तथापि कोणीही पुढे आले नाही. शेवटी त्या साधू पुरुषांनी स्वतःचा बळी देण्याचे ठरवले. त्यावर त्यांनी सांगितले की मी चालावयास सुरुवात केल्यानंतर ज्या स्थानी थांबेन तिथे माझे मस्तक कापावे आणि त्यानंतर माझे धड जिथे कोसळेल तिथे किल्ल्याचे निर्माण होईल. तो साधू पुरुष जिथे पहिल्यांदा थांबला तिथे भैरव पोल असा मोठा दरवाजा आहे तिथे त्यांचे मस्तक कापले गेले.

     भैरवपोल

.

      तिथुन त्यांचे धड जवळपास 500 मीटर पुढे चालत गेले आणि तिथे मुख्य किल्ला उभारला गेला आहे. किल्ल्याच्या आत मध्ये त्यांची समाधी देखील बांधली आहे. आजही तिथे त्यांची पूजा होते आणि त्यानंतर हे पूर्ण किल्ल्याचे बांधकाम केले गेले. हा किल्ला समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर आहे आणि या किल्ल्याची भिंत 36 किलोमीटर लांब आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर ही जगातील सर्वात लांब भिंत आहे. भिंतीची जाडी ही पंधरा फूट आहे.

फोटो

.

.

टेहळणी बुरुज

.

.

     इथून वरती गेल्यानंतर तिथे महाराणा प्रताप यांचे बालपण जिथे गेले ते प्रांगण दिसते. तसेच एक देवीचे मंदिर आहे. जिथे आज देखील अखंड ज्योत तेवत आहे. त्याची जबाबदारी ही संबंधित पुजार्यांकडे परंपरागत आहे. आज देखील एक स्त्री याची व्यवस्था पाहते. ती सकाळी लवकर येऊन मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करते व दुसऱ्या दिवशी सकाळी परत येते. तिथे मंदिराचे दरवाजे बंद असतात. आम्ही त्या मंदिराच्या बाहेर उभे राहिलो तर आतील ज्योतीची धग आम्हाला बाहेरही जाणवत होती.

.

     तेथून आम्ही किल्ल्याच्या वरती आलो. चित्तोडगड मध्ये महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंग यांना त्यांचे चुलते मारावयास आले असता पन्ना दाईने त्यांच्या जागी आपल्या मुलाला ठेवून, उदयसिंग यांना गूपचूप कुंभलगड किल्ल्यावर पाठवले. आपल्या धन्याला वाचविण्यासाठी स्वत:च्या मुलाचे प्राण पणास लावणाऱ्या पन्ना दाईचा त्याग मोठा मानला जातो. महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला व त्यांचे बालपण देखील याच किल्ल्यावर गेले. अन्न व पाणी नसेल तर सैनिक लढू शकत नाहीत ही गोष्ट विचारात घेऊन किल्ल्याच्या आसपास धरण व बंधारे घालून पाण्याचा साठा केलेला आहे. त्यामुळे अन्नधान्य व पाणी याची कमतरता या किल्ल्यावर कधीही जाणवली नाही. किल्ल्याच्या आत देखील एक मोठी विहीर आहे आणि त्या विहिरी मधून पूर्ण किल्ल्यामध्ये पाणी खेळवले जात होते. थोडक्यात हा किल्ला अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे. परंतु जर गाईड सोबत असेल तरच या गोष्टी समजू शकतात. गडाच्या सर्वात वरच्या टोकावरुन अरवली पर्वतरांगांचे नयनरम्य दृश्य दिसते. संपूर्ण किल्ला पहायला आम्हाला अडीच तास लागले.

फोटो

.

.

.

     इथून आम्ही हल्दीघाटीकडे प्रस्थान केले. साधारण 1 च्या सुमारास आम्ही महाराणा प्रताप म्युजियमपाशी पोचलो. बाजूलाच चेतक रेस्टॉरंट आहे तीथे राजस्थानी थाळी घेतली. नवऱ्याने दाल-बाटी घेतली. दोन्हीही चवीला अप्रतीम होते.

.

      हल्दीघाटी येथील राणाप्रताप म्युजिअम-

     हल्दीघाटी येथील महाराणा प्रताप म्युझियम सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडे असते. येथे तीस रुपये प्रति व्यक्ती प्रवेश फी आहे. येथे एक संग्रहालय असून तेथे युद्धाशी संबंधित शस्त्रे व इतर गोष्टींचे प्रदर्शन आहे. त्यानंतर एक व्हिडिओ शो होतो ज्यामध्ये सर्व ग्रुपला एकत्र या संग्रहालयाचे निर्माण कसे झाले याबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर सर्व ग्रुपला एका थिएटरमध्ये नेले जाते तेथे हलदी घाटीच्या युद्ध यावरती एक डॉक्युमेंटरी शो दाखवला जातो. त्यानंतर दृक-श्राव्य माध्यमाद्वारे आभासी पुतळ्यांवर प्रकाशझोत टाकून महाराणा प्रताप यांच्या आयुष्य कालातील घडलेल्या घटनांचे वर्णन पाहत पाहत आपण त्या संग्रहालयातून बाहेर पडतो. या सर्व गोष्टी पाहण्यात साधारण एक तास जातो.

फोटो

.

.

राणा प्रताप यांचे सोबती

.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

.

.

फेटा एवढा मोठा आहे. डोकं किती मोठं असेल!

.

.

.

.

.

.

महाराणा प्रताप यांचे साथीदार

.

.

     येथे अनेक आयुर्वेदिक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. ते तेथे आलेल्या पाहुण्यांनागुलाब अर्काचे सरबत थोडेसे चाखावयास देतात. आम्हाला अतिशय आवडले म्हणून आम्ही एक बाटली विकत घेतली. दोनशे रुपयाला एक बाटली मिळते. म्युझियमच्या आवारातच पारंपारिक पद्धतीने गुलाबांचा अर्क काढला जातो. त्याचे यंत्र.

.

     संग्रहालयाच्या जवळच चेतक घोड्याची समाधी आहे. २१ जून १५७६ रोजी तेथे घनघोर युद्ध झाले. राणाप्रतापनी अकबराच्या सैन्याला हळदीघाटच्या खिंडीत गाठले. राजपुतांचा सेनापती होते हकीम शहा सुर एक पठाण होते. तर अकबराचा सेनापती होता मानसिंग. या लढाईमध्ये राणा प्रताप यांनी मानसिंग च्या हत्ती समोर येऊन जोरदार भाला फेकला. परंतु मानसिंगने तो वार चुकवला व स्वतःचे प्राण वाचवले. त्यावेळी महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक यांनी हत्तीच्या सोंडेवर चढून राणा प्रताप यांना वार करण्यास मदत केली होती. तथापि त्याचवेळी हत्तीने हातातील तलवारीने घोड्याचा एक पाय जखमी केला. तीन पायावरती दौडत घोडा चेतक याने महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी नेले. या सुरक्षित स्थळी नेताना त्याला नाला पार करण्यासाठी मोठी उडी मारावी लागली. जखमी अवस्थेतील चेतकने महाराजांना सुरक्षितपणे सोडूनच आपले प्राण त्याग केले. त्याची समाधी सुद्धा या म्युझियम जवळच आहे.

फोटो

.

     तेथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर हल्दीघाटी आहे.हल्दीघाटी हे नाव तेथील मातीच्या पिवळ्या रंगावरुन पडले आहे.

फोटो

.

     हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांचे सैन्य कमी होते.अकबराचे सैन्य खूप जास्त होते. तथापि गुरील्ला पद्धतीने राणा प्रताप यांच्या सेनेने अकबराच्या सेनेचा धुव्वा उडवला. हे युद्ध अनिर्णित राहिले . कारण की या युद्धा मध्ये कुठल्याच राजाचा मृत्यू झाला नाही. हल्दीघाटी मध्ये झालेल्या युद्धाचा महाराणा प्रताप यांच्या वरती खूप परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी सर्वच राजेशाही पद्धतींचा त्याग केला. ते रानावनात राहू लागले. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी मेवाडचा सर्व प्रांत हा अकबराच्या प्रभावातून मुक्त करण्याची शपथ घेतली. आणि पुढच्या बारा वर्षाच्या काळातही मोठ्या प्रमाणात निधी उभा करून सहकाऱ्यांना युद्ध प्रशिक्षणात गुंतवून ठेवून बराचसा प्रांत त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यातही घेतला. केवळ चित्तोडगड वरती स्वारी करणे बाकी होते. परंतु हल्दीघाटीमध्ये त्यांना प्राप्त झालेल्या जखमांनी नंतर उग्र स्वरूप धारण केले आणि वयाच्या 56 व्या वर्षी या महावीर योद्ध्याचा मृत्यू झाला. मेवाड प्रदेशातील लोक केवळ दोघांनाच खर्या अर्थाने राजे मानतात. एक महाराणा प्रताप व त्यांचे घराणे व दुसरे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे घराणे! कारण दोघांनीही मुघलांसमोर शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही. हे कुठेही गेलात तरी इतिहासाच्या अनुषंगाने जागोजागी ऐकायला मिळते. महाराणा प्रताप यांचे जीवन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवना यात बरेच साम्य आढळते. हल्दीघाटीच्या युद्धाची माहिती ऐकत असताना आपणही भावनिक होऊन जातो.

     हल्दीघाटीवरुन दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर रक्त तलाई आहे. हल्दीघाटीच्या युद्धाच्या वेळेला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. तथापि मोठ्या प्रमाणात कत्तल झाली होती. दोन्ही बाजूंचे अनेक योद्धे वीरगतीस प्राप्त झाले होते. त्यामुळे अनेक प्रेतावरून हे पावसाचे पाणी वाहत जाऊन एका विशिष्ट जागी जाऊन साठले. मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असल्यामुळे या पाण्याचा रंग लाल होता. त्यामुळे या रक्ताच्या पाण्याचे तळे साठले. हीच जागा पुढे रक्त तलाई म्हणून प्रसिद्ध झाली. येथे राजपुतांच्या सेनेतील वीरगती प्राप्त झालेल्या वीरयोद्ध्यांचे तसेच हाकिमशाह सुरी या सेनापतीचेही स्मारक आहे. हल्दीघाटीच्या जराच पुढे हाकिम शहासूर यांचे मस्तक पडले. परंतु त्यांच्या घोड्याने त्यांचे धड पळवत पळवत रक्त तलाई येथे नेले. तेथेच त्यांचे दफन करण्यात आले आहे.तेथे श्री.खान जे गाईड खान या नावाने ओळखले जातात त्यांच्याकडे हकीमशाह सुरी यांच्या समाधीचे जतन करण्याचे काम आहे. त्यांनी रक्त तलाई या स्थानाबद्दल व हल्दीघाटी च्या युद्धाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार हकीमशहा सूरी यांच्या हातात तलवार होती. ती कुणालाच काढता आली नाही. त्यामुळे तलवारीसह त्यांचे येथे दफन करण्यात आले आहे.

फोटो

.

.

.

.

     राणा प्रताप संग्रहालय, चेतक समाधी, हलदी घाटी व रक्ततलाई हे सर्व पाहण्यात आमचा बराच वेळ गेला. तेव्हा पाच वाजले होते. वेळ कसा गेला हे कळलेच नाही. सहस्र बाबू मंदिर हे सहा वाजता बंद होते. आम्हाला तिथे जाण्यासाठी सहा वाजणार होते .त्यामुळे आम्ही वेळेत तिथे पोहोचू की नाही याचे प्रचंड टेन्शन आले. कारण ते मंदिर खूपच सुंदर असून पाहण्यासारखे होते तरी तिथे आता अजिबातच पुरेसा वेळ मिळणार नव्हता. आम्हाला आत तरी सोडतील की नाही अशी शंका होती. ड्रायव्हरने हे सर्व लक्षात घेऊन आपल्या परीने वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सहस्त्रबाहू मंदिर येथे पोहोचलो तेव्हा सूर्यास्त झाला होता. परंतु अजून पूर्ण अंधार पडला नव्हता. सहा वाजले होते. परंतु आत कुणाचे तरी प्रिवेडींग शूट चालू होते. दोन ग्रुप्स होते. त्यामुळे आम्हाला तिथल्या माणसांनी आत मध्ये सोडले. आम्ही आत गेलो आणि अतिशय हताश वाटले. कारण मंदिर अतिशय सुंदर होते. हे मंदिर पाहायचं सोडून आपण हल्दीघाटी व रक्त तलाई येथे फारच वेळ घालवला असे आमचे मत झाले. परंतु आता नाईलाज होता. आम्ही शक्य तेवढे भराभर फोटो काढू लागलो. परंतु फोटोचा ग्रुप मुख्य मंदिराच्या समोरच फोटो काढत असल्यामुळे आम्हाला काही तिथे जाऊन फोटो काढता येईना. आम्ही अंधार पडायच्या आधी शक्य तेवढे फोटो काढून घेतले आणि मुख्य मंदिराच्या तिथून हे ग्रुप कधी जातात याची वाट पाहू लागलो. ते ग्रुप तिथून जाताच आम्ही त्या मंदिराचेही फोटो काढून घेतले. परंतु पूर्णतः अंधार असल्यामुळे मंदिराच्या आतले मात्र फोटो काही काढता आले नाहीत. साधारण अर्धा तास आम्ही तिथे होतो. तिथे गाईड वगैरे अशी काही व्यवस्था नाही. हे पाहायला एक-दोन तास तरी वेळ राखीव हवा.

काही फोटो-

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

     त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या एकलिंगजी मंदिर येथे आम्ही गेलो. एकलिंगजी हे मेवाड राजांचे कुलदैवत. युद्धाला निघण्यापूर्वी ते इथे दर्शनासाठी येऊन आशिर्वाद घेत असे कळले. दर्शनात फारशी रांग वगैरे नव्हती. व्यवस्थित दर्शन झाले. येथे फोटोग्राफी परवानगी नसल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. आता घरी परतायचे होते. आजचे सर्व स्थळ दर्शन पार पाडले होते. फक्त सहस्त्रबाहू मंदिर याकरिता म्हणावा तसा वेळ देता आला नाही त्याचे दुःख मात्र मनात नक्की होते. परंतु स्वतः नियोजन केलेल्या प्रवासात असे काहीतरी कमी जास्त व्हायचेच. आम्हाला रूमवर पोहोचायला साधारण नऊ वाजले. उद्याचा दिवस मुद्दामच निवांत ठेवला होता. स्थानिक उदयपूर फिरायचे होते. राहिलेले स्थलदर्शन करायचे, थोडेफार खरेदी करायची, असं उद्याच्या दिवसाचे निवांत नियोजन होते. त्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. दिवसभर खूप दमल्यामुळे आम्ही लगेचच झोपी गेलो.


आम्ही फक्त एकलिंगजी आणि नाथ द्वारा (फक्त बंद दारच)पाहून परतलो. नाथ द्वारा बाजारातले विक्रेते लबाड वाटले. सगळा माल सूरत,नवसारी इथून येतो.@कंजूसजी तेथील मंदिरे बरीच लांब होती. पाहण्यासारखे काही आहे असे वाटले नाही . दगडी बांधकाम आहे कलाकुसर अशी काही नाही .एकूण साडेतीनशे मंदिरे आहेत .किती किती पाहणार? शिवाय तिथे आता पूजा होत नाही. नुसतेच अवशेष आहेत. आम्हाला दिवसभरात अजून बाकीचे स्थल दर्शन करणे ही बाकी होते त्यामुळे मंदिरे पाहणे टाळले. कुंभलगड येथे बरीच पायपीट करावी लागते. विशेषतः तो गडाच्या दगडी रस्त्याचा चढ चढून जाणे हेच मोठे आव्हान आहे. बाकी गडावर फिरावे लागते त्याचे काही वाटत नाही. गडावरील सर्वच ठिकाणे व मंदिर ही पाहायची असे म्हणले तर मला वाटते तीन चार तास पुरेसे आहेत. नाथद्वाराला आम्ही जायचे टाळले त्याचे कारण सुरुवातीच्याच एका लेखात दिले आहे.

@कपिलमुनी नक्कीच जा. खूप सुंदर आहे हा प्रदेश...
फोटो एकापेक्षा एक सुंदर. सास बहू मंदिर खूप आवडले. माहिती, वर्णन दोन्हीही छानच.
एक छोटासा बदल मात्र करा.
हा किल्ला डोंगरावर तीन हजार सहाशे मीटर उंच आहे
येथे मीटर ऐवजी फूट करा.

@श्वेता , ओघवते वर्णन लेखावरून नजर काढू देत नाही. फोटो खुपच सुंदर आहेत. सिटी पॅलेस,सहेली की बाडी उदयपुर, सिलीशेड,जयसमंद,विजयमंदिर अलवर अशा अनेक राजस्थानी शहरात हिन्दी चित्रपट चित्रीत झाले आहेत.'मेरा साया' या चित्रपटातील तु जहाॅ जहाॅ रहेगा हे गणे त्यापैकीच एक.

भैरव पोल जवळपास सर्वच किल्ल्यांवर बघायला मिळेल.
महाभारत कालात भिमाने आपल्या गदेने डोंगरला मोठ्ठे गोल भगदाड पाडले. त्या जागेला पांडूपोल म्हणतात.

पोल म्हणजे दरवाजा.
सर्व लेख पुन्हा एकदा वाचुन काढणार आहे.

मिपावरील भटके भटकंतीचे इतके सुंदर वर्णन करतायत की सर्व एकत्रीत करून मस्त पुस्तक बनू शकते.

सर्व भटक्यांनी विचार करावा.


"इकडचे किल्ले, गढ्या, राजवाडे, मंदीरे खूपच सुंदर आहेत आणि त्यांची हानी पण झाली नाही / हानी केली नाही."

राजस्थानच्या मेवाड प्रांतात मुघलांना अतिशय कडवा विरोध झाला होता. तिथल्या लोकांनी प्राणांची आहुती दिली पण मुघलांशी तडजोडी केल्या नाहीत त्यामुळे मेवाडमधलया कित्येक पुरातन वास्तूंची हानी झालेली आहे. त्याउलट मारवाड प्रांतात मात्र आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी मुघलांशी अनेक तडजोडी केल्या गेल्या अगदी रोटी-बेटी व्यवहारही केले गेले (जोधा-अकबर हे एक उदाहरण).

मुघलांचे मांडलिकत्व पत्करणाऱ्या, मालमत्तेसाठी त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करणाऱ्या मारवाड प्रांतातील लोकांविषयी आजही मेवाड प्रांतातील लोकांच्या मनात प्रचंड अढी आहे आणि विशेष म्हणजे ते ती लपवतही नाहीत!
"हिंदुस्तान के दो ही शेर... एक महाराणा प्रताप और दुसरा छत्रपती शिवाजी..." हे तिथल्या मुलांच्या मनावर अगदी लहानपणा पासूनच बिंबवले जाते आणि उदयपूर, हल्दीघाटी, चितोडगड पासून संपूर्ण मेवाड प्रांतात फिरताना आपल्याला त्याची प्रचिती येत राहाते!

ही सर्व ठिकाणे मनमुरादपणे बघीतली/अनुभवली आहेत, आणि तुम्ही ती जशीच्या तशी पुन्हा डोळ्यांसमोर उभी केलीत त्यामुळे माझ्याकडुन ह्या भागासाठी १०० पैकि १०० मार्क्स! खुप छान लिहिलं आहेत 👍

सहस्त्र बाहु मंदीरासाठी तुम्हाला वेळ कमी पडला ह्याची हळहळ वाटली! आम्ही ह्या ठिकाणी २०१६ च्या एप्रिल महिन्यात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे पोचलो होतो आणि तेव्हाही मंदिर सहा वाजताच बंद होत होते पण तेव्हा दिवस मोठा असल्याने संध्याकाळी सात-सव्वा सात पर्यंत चांगला उजेड असायचा. मंदिर नीट बघायला किती वेळ लागतो ह्याची पूर्ण कल्पना असलेल्या आमच्या अनुभवी ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे प्रवेश करतानाच तिथल्या रखवालदाराच्या हातावर शंभर रुपये टेकवल्याने मग त्यानेही बिचाऱ्याने ठार अंधार पडल्यावर आम्ही स्वतःहून तिथून बाहेर पडेपर्यंत आम्हाला डिस्टर्ब् केले नव्हते!

तुमचे चेहेरे झाकण्यासाठी स्मायलीचा वापर करावा लागल्याने गाभाऱ्याची पार्शवभूमीही थोडी झाकली गेली असल्याने मंदिराचा समोरून काढलेला माझा एक फोटो 😀
sahastrbahu

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती चौथा व पाचवा दिवस (अंतीम)

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पहिला दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती दुसरा दिवस
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती तीसरा दिवस

     आज आमच्या सहलीचा चौथा दिवस होता. सकाळी सर्वचजण उशीरा उठलो. झोप मस्त झाली होती. आवरुन निवांत नाश्ता करुन आज स्थानिक स्थलदर्शन करायचे होते. कालच्या ड्रायवरच्या ओळखीचा एक रिक्षावाला दिवसभरासाठी 800 रु. या दराने ठरवला. तो आम्हाला 11 वाजता घ्यायला येणार होता. आज आम्ही सहेलियोंकी बाडी व फतेहसागर लेक पाहणे, अस्सल राजस्थानी पद्धतीचे जेवण जेवणे (दाल- बाटी सोडून) व खरेदी करणे इतकेच ठरवले होते. या तीन दिवसात खूपच जास्त चालणे- फिरणे झाले होते. त्यामुळे आजचा दिवस निवांत ठेवला होता. ठरलेल्या वेळी आमचा रिक्षावाला आला. आम्ही सहेलियोंकी बाडी येथे गेलो. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही बाग पर्यंटकांसाठी खुली असते. तिकीट दर रु.10 आहे. हि बाग अतीशय रम्य असून अगदी एकदा तरी पहावीच अशी आहे.

      या बागेविषयी थोडक्यात माहिती अशी की 18 व्या शतकात महाराज संग्राम सिंग यांनी आपल्या पत्नीला भेट म्हणून या बागेची निर्मिती केली. ही राणी आपल्या लग्नानंतर स्वत: सोबत 48 दासींना सोबत घेऊन आली होती. त्यामुळे राजपरिवारातील लहान मुली व दासींना खेळण्याकरीता व त्यांच्या मनोरंजनाकरीता या बागेची निर्मिती करण्यात आली . ही बागदेखील वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. फतेहसागर तलावातील पाणी येथील कारंज्यांसाठी उपयोगात आणले जाते. इथले कारंजे त्याकाळी इंग्लंडमधून आयात केले होते. काही कारंजे विशिष्ट पद्धतीने टाळी वाजविली की सुरु होतात व बंद होतात. हे गाईड बरोबर करुन दाखवतात. आम्हाला काही जमले नाही. आम्ही काही येथे गाईड घेतला नव्हता कारण ही सर्व माहिती जाण्याआधीच माहिती होती. ही बाग पाहण्यासाठी किमान 1 तास तरी हवा. बागेच्या आत कलांगण नावाचे चित्रप्रदर्शन आहे. मेवाडच्या राजा-राणीच्या या बागेच्या अनुषंगाने प्रसंगाचे रेखाटन या चित्रांमध्ये आहे. तिथे फोटोग्राफी मनाई आहे. प्रवेश निशुल्क आहे. चित्रे छान आहेत.फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांनी तर हे ठिकाण मुळीच चुकवू नये.

काही फोटो

.

.

.

.

.

     इथे फोटो काढत असताना एक गंमत झाली. एका कारंज्यापाशी मी माझ्या मुलाला फोटो काढताना काही सूचना देत होते. आमच्या बाजूला एक कॉलेजवयीन मुलांचा समुह होता. त्यातील एका मुलाने माझ्याकडे पाहिले व ओळखीचे हसला. मी त्या मुलाला फॅमिली फोटो काढण्याची विनंती केली. त्यावर त्याने विचारले की महाराष्ट्रातून कुठून आलात? माझ्या नवऱ्याने सांगितले मुंबईहून आलो, पण आम्ही मूळचे कोल्हापूरचे. त्यावर तो मुलगा उत्तरला की मीही कोल्हापूरचाच आहे. इथे कोटा येथे शिकण्यासाठी राहत आहे. मग काय! दोन कोल्हापूरकर भेटल्यावर गप्पा रंगल्या. मग अजून एक जोडी व त्यांचा मुलगा आमच्याशी बोलायला आले. तेही कोटा येथे राहणारे लष्करी कर्मचारी होते. ते मूळचे बेळगावचे व कोल्हापूरात अनेक नातेवाईक असलेले. मराठी भाषा कानावर पडताच एकत्र आलेलो आम्ही सगळे 15-20 मनिटे बोलून आपापल्या दिशेला पांगलो.

.

.

.

.

.

.

.

     12 वाजून गेले होते.. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली आम्ही साधारण 1 तासभर बसलो. आजुबाजूला गर्द हिरवी झाडे व थंडगार वारे वाहत होते. भरदुपारीही तिथले वातावरण आल्हाददायक होते. मुलगा आसपास खेळत राहिला आणि आम्ही शांततेचा व त्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत राहिलो. साधारण 1 वाजता आम्ही तेथून(नाईलाजास्तव) निघालो. कारण भूकेने आवाज द्यायला सुरुवात केली होती. आम्ही रिक्षावाल्याला काही स्थानिक प्रसिद्ध रेस्टॉरंटबद्दल चौकशी केली . त्याने 3-4 ठिकाणी नेले परंतू तिथले मेनू पाहून निराशा झाली. डाल-बाटी सोडून कोणी काही द्यायला तयार नव्हते. व आम्हाला ते सोडून इतर पारंपारीक पदार्थ खायचे होते (जसे की केर-सांगरीची भाजी).

     मी आधीच एक ट्रॅडीशनल खाना नावाचे रेस्टॉरंट गुगलवर शोधून ठेवले होते. तेथे अस्सल पारंपरीक जेवण मिळते व त्याचे रिव्ह्यूही छान होते. परंतू एक थाळी 800 रु होती, जी मला खूप जास्त वाटत होती. शेवटी मी नवऱ्याला याबद्दल सांगितलं व तो म्हणाला ट्राय करु.सहेलियोंकी बाडी पासून हे रेस्टॉरंट जवळच आहे. आम्ही तीथे गेलो. तिथली रचना पारंपरीक होती. द्रोण व पत्रावळीतच जेवण वाढतात. गेल्या गेल्या आम्हाला थंडगार गुलाब सरबत पिण्यास दिले गेले. नवऱ्याने काय काय पदार्थ आहेत ते विचारले. त्यांनी सांगितलेले मेनू ऐकून आम्ही हेच शोधत होतो याची खात्री पटली व आम्ही 2 थाळींची ऑर्डर दिली. थाळी अनलिमिटेड होती. मुलगा माझ्याच ताटात जेवणार होता, ते त्यांना चालणार होतं (आपल्या इथे असं चालत नाही. निम्मा चार्ज घेतात.)
थाळीचा फोटो

.

     ताटात डावीकडून सांगते.... केर-सांगरीची भाजी. ही भाजी पाच प्रकारच्या जंगली काटेरी वनस्पतींपासून (याला पंचकूटा पण म्हणतात) बनवली जाते. खूप औषधी असते. पंचकूटा वाळवून वर्षभर खाल्ली जाते. राजस्थानमध्ये गेलात तर ही भाजी खायला विसरु नये. मिरचीचा तिकोरा (लोणचे टाईप), खजूर व किसमिसची चटणी , ही सर्वाधिक चविष्ट होती. लसूण चटणी व सूंठ चटणी. त्याच्या उजवीकडे चूरम्याचा लाडू व बेसन वडी. त्यानंतर बाजरीचा पापड. मध्यभागी जकोलमा पूरी. ही पूरी गव्हाच्या पीठाचीच असते परंतू ही बनविणे अत्यंत कठीण आहे . खूप सॉफ्ट असते व तोंडात विरघळून जाते. डावीकडून द्रोणात चण्याची आमटी(डाळ), गोविंद गट्टे, कढी, चक्केकी सब्जी- ही सर्वात चविष्ट होती आम्ही तीनदा घेऊन खाल्ली, उडीद डाळ, कुल्हडमध्ये थंड व फ्रेश ताक!!

     सर्वप्रथम हे आम्हाला ताटात थोडे थोडे वाढले गेले व कशाबरोबर काय खायचे हे सांगून प्रत्येक पदार्थ चाखायला लावला. हे मार्गदर्शन करण्यासाठी वाढपी तिथेच उभा होता. हे खूप गरजेचे होते. कारण त्यामुळे पदार्थांची चव वाढली व सर्व पदार्थांचा आम्ही पूरेपूर आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी बाफला (सॉफ्ट बाटीसारखा), पकोडी पुलाव व बाजरेका खिचडा हे पदार्थ चाखायला सांगितले. तथापि आम्ही खाण्यात एवढे मग्न की मी नंतर फोटो काढायचे विसरले. त्यानंतर त्यांनी सर्व पदार्थ आम्हाला लागतील तसे वाढले. इथे वाढताना सुरुवातीस अगदी घास-घासभर वाढतात व सर्व पदार्थ चाखून झाले की मग आपल्याला पाहिजे तसे वाढतात. त्यामुळे आपण आवडीच्या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतोच, शिवाय अन्नही वाया जात नाही.

      पकोडी पुलाव जबरदस्त होता. तर बाजरेका खिचडा हा मला त्या सर्व थाळीत सर्वात जास्त आवडलेला पदार्थ. आपल्याकडे ज्वारीच्या कण्या करतात तशाच या बाजरीच्या कण्या. फक्त त्यात खूप सारे तूप व साखर घालून खातात. एक घास खाताच मी तृप्त होऊन डोळे मिटले.
शेवटी खास फोटोसाठी घेतलेल्या बाजरेका खिचडाचा फोटो

.

     मी अतीशयोक्ती नाही करत. हे जेवण माझ्या आयुष्यात जेवलेल्या काही सर्वोत्तम जेवणांमधील आहे. हा एक सोहळा होता व तो आम्ही पूरेपूर साजरा केला. नवऱ्याने सर्व ताट चाटून पुसून साफ केले. मुलाने पूरी व चक्केची सब्जीवर ताव मारला. रेस्टॉरंटचे मालक प्रत्येक टेबलवर जाऊन अगत्याने विचारत होते की, जेवण कसं वाटलं म्हणून. आमच्या टेबलापाशी आल्यावरही त्यांनी हाच प्रश्न विचारला. नवरा म्हणाला सिर्फ पेट ही नही भरा... मनभी भर गया!(हिंदी?....) त्यांना कळलं असावं आम्हाला काय म्हणायचंय! ते समाधानाने हसले. त्यांनी मला विचारलं की मी पाहतोय, तुमच्या मुलाने काहीच खाल्ले नाही. तो पुरेसा जेवला आहे असं मी सांगितलं तरी त्यांनी वाढप्याला बोलावून भात वाढायला सांगितला व मुलाला 2 घास खायलाच लावले! तृप्त मनाने आम्ही तेथून बाहेर पडलो. उदयपूर सहलीत, जरी ही थाळी थोडी महाग असली तरी पैसा वसूल आहे, त्यामुळे मीस करु नये.

     आता दुपारचे 2 वाजून गेले होते. एवढे सारे जेऊनही हलकेच वाटत होते. आता आम्हाला शॉपिंग करायचे होते. आम्हाला काही शो-पीसेस व ड्रेस मटेरिअल खरेदी करायचे होते. काही स्वस्तात मस्त वस्तू दिसतात का याचा आम्ही शोध घेऊ लागलो. शेवटी हाथी पोल येथील मार्केटमध्ये आम्हाला सर्व मनासारख्या वस्तू मिळाल्या. खरेदीच्या अनुषंगाने अजून एक अनुभव सांगते. करणी माता मंदीरहून येताना रिक्षावाल्याने एका गव्हर्मेंट दुकानापाशी आमची रिक्षा थांबवली. तिथे आम्ही आयुर्वेदिक असा केसाला लावायचा कलप (हेअरडाय) (रु.450)आणि केसाला लावण्याची काही प्रॉडक्ट्स (शिकेकाई पावडरसारखे )(रु.250) विकत घेतले. तथापि दोन्ही प्रोडक्ट्स बकवास आहेत. त्या दुकानदाराचा असा दावा होता की हा कलप स्किनला लागत नाही. हा पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. एकदा लावला की तीन-चार महिने रंग जात नाही. त्यामुळे ट्राय करुन बघूयात म्हणून केसाचा कलप आम्ही घेतला. तथापि आता तीन ते चार वेळा आमचा लावून झालेला आहे. अत्यंत फालतू प्रॉडक्ट आहे. त्यामुळे कोणी उदयपूरला जाणार असेल आणि दुकानदाराने कितीही कन्व्हिन्स केले तरी ही आयुर्वेदीक हेअरडाय किंवा केसाची शिकेकाई, फेस पॅक इ. खरेदी करू नका, असा माझा सल्ला आहे.

     आता बोटींगकरीता फतेहसागर लेक येथे जायचे होते. सहलीच्या दुसऱ्या दिवशीच सिटी पॅलेस झाल्यानंतर करणी माता मंदिर ला जायचे आणि येताना सरकारमान्य बोटीतून बोटिंग करायचे असे ठरवले होते. परंतु करणी माता मंदिर येथेच आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आमचे लेक पिचोलामध्ये बोटिंग करण्याचे राहून गेले. खरं म्हणजे सर्व पर्यटक असे लिहितात की लेक पिचोला मध्ये तुम्ही बोटिंग नाही केलं तर तुमची उदयपूर सहल अपूर्ण राहते. वेळेअभावी आम्ही शेवटपर्यंत लेके पिचला मध्ये बोटिंग करुच शकलो नाही. तसेही जवळपास रोजच आम्ही गणगौर घाटावरती जाऊन लेक पिचोलाचे दर्शन करतच होतो. त्यामुळे बोटिंग करताना आम्हाला परत काही वेगळे दृश्य दिसले असते असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे आम्ही फतेहसागर लेक येथेच बोटिंग करायचे ठरवले होते. एव्हाना 5 वाजत आले होते. आम्ही नेहरु गार्डन, फतेहसागर लेक येथील बोटींग पॉईंटला पोचलो.

.

     फतेहसागर येथे साध्या बोटींगचे तिकीट काढले. यात लेकच्या मध्यभागी बेटावर साधारण 15-20 मिनिट सोडणार होते व तेथून परत यायचे अशी अर्धा तासाची फेरी होती. प्रतिव्यक्ती 75 रु. तिकीट होते. आमचा 10 जणांचाच्या ग्रुपला पाच मिनिटात बेटावर सोडून बोट निघून गेली. त्या बेटावर गार्डन आहे. हा निव्वळ फोटो पॉईंट आहे. इथे बाकी काही नाही.
काही फोटो

.

.

.

.

.

.

.

     आम्ही भरपूर फोटो काढले. तरीही वेळ उरलाच . शेवटी कंटाळा आला व सर्वजण बोट कधी येतेय याची वाट बघत किनाऱ्यावर बसलो. 10 मिनिटानी एक बोट आम्हाला परत घेऊन जायला आली तेव्हा बाजूने बऱ्याच स्पीड बोटी जात होत्या. मुलाने स्पीड बोट सफारीचा हट्ट धरला. मी मान्य केला. नवरा मात्र कंटाळला होता त्यामुळे आम्ही दोघांचेच तिकीट काढले. माणशी 130 रु. तिकीट होते. इथे बोटींगचे अनेक पॉईंट आहेत व प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत.

     साध्या बोटीचा अनुभव खूपच कंटाळवाणा होता. परंतू स्पीड बोटीचा अनुभव अतीशय थरारक होता. शेवटी बोट लाटांवरुन उडून परत पाण्यात आपटली तेव्हा मस्त वाटले. स्पीड बोटींग करत असताना सूर्यास्त होत होता,ते दृश्यही खूप छान दिलत होते. मी व मुलगा जाम खुश झालो.
फोटो

.

     त्यामुळे फतेहसागर लेक येथे केवळ स्पीड बोटींग करावे. साधे बोटींग करुन पैसा व वेळ दोन्ही वाया घालवू नये असे मी ठामपणे म्हणू शकते. आता 6 वाजून गेले होते. उंट सफारी प्रतीव्यक्ती 200 रु. सांगितली. मुलाने ठाम नकार दिला. नवराही उत्सुक नव्हता. मीही याआधी खूपवेळा उंटावर बसले असल्याने शेवटी माझाही उत्साह बारगळला.

     आता आम्ही खाण्या-पिण्याकडे मोर्चा वळवला. मुलाने चॉकलेट आईस्क्रीम घेतले. मला भूक अशी नव्हती. पण कंकाकांनी सूचविल्याप्रमाणे तिथे रबडी ट्राय करायचे ठरवले. एक स्वच्छसे दुकान पाहून तिथे आम्ही दोन्ही पदार्थ ऑर्डर केले.
फोटो

.

     दोन्हीही मस्त होते. नवऱ्यानेही रबडी टेस्ट केली. मग एक ग्लास गरम दूधही घेतले. कारण सूर्यास्तानंतर थंडी पडायला लागली होती. 7 वाजत आले होते. उद्या आम्हाला हॉटेल चेकआऊट करुन चितौडगढला जायचे होते. दिवसभर चितौडगढला भ्रमंती व रात्री 11 वाजता तेथूनच रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करायचे होते. त्यामुळे हॉटेलचे बील पे करणे, सामानाची बांधाबांध करणे या गोष्टींसाठी रुमवर लवकर जाणे भाग होते. रात्री मुलगा व नवऱ्याने रुमवर हक्का नूडल्स ऑर्डर केल्या. सर्व आटोपेपर्यंत नऊ वाजले.

      आज आमच्या तळ्याच्या काठी वास्तव्य असण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या आम्हाला सकाळीच 7 वाजता हॉटेल सोडायचे होते. मुलगा लवकर झोपी गेला व नेहमीप्रमाणे आम्ही खिडकीतून बाहेरचे तळ्याकाठचे दृश्य पाहत गुजगोष्टी करत बसलो. या 4 दिवसात कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांसोबत अतीशय आनंदाचा काळ व्यतीत केला होता. लग्नानंतर मधूचंद्रासाठी गोव्याला गेलो, त्यानंतर गेली 10 वर्षे आम्ही कुठेही बाहेरगावी ‘फिरण्यासाठी’ म्हणून गेलोच नव्हतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात असे निवांत क्षण वेचणे किती महत्वाचे असते हे नवऱ्याला कळून चुकले होते. अशी ट्रीप तू दरवर्षी प्लान कर, आपण जात जाऊ असे आश्वासन नवऱ्याने दिले. मला खूप बरे वाटले व इतक्या दिवसापासून केलेल्या नियोजनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले..........!

     दुसरे दिवशी सकाळी कालचाच रिक्षावाला ठरलेल्या वेळी सकाळी 7 वाजता घ्यायला आला. उदयपूर ते चित्तौडगड हे अंतर साधारण 111 कि.मि. आहे. रस्ता अतीशय चांगला असून हायवे आहे. त्यामुळे उदयपूरवरुन 2 तासात पोचता येते. आम्हाला सरकारी बस स्टॅंडवर न सोडता रिक्षावाल्याने खाजगी बस स्टॅंडवर सोडले कारण बसची फ्रिक्वेन्सी जास्त व बसायला फिक्स जागा मिळते म्हणून. या गाड्यांना गर्दी असते. त्यामुळे आम्ही खाजगी बसने जायचे ठरवले. बस अर्ध्या तासाने आली . ट्रॅवल्ससारखी होती. आरामात प्रवास झाला. रु.80 तिकीट होते सरकारी बसचे रु.45 असते.

     वाटेत एका ठिकाणी नाश्त्याकरीता गाडी थांबली. ड्रायवर व कंडेक्टर नाश्त्यासाठी उतरले. हे एक मोठे मिष्ठान भांडार होते. बाहेर गरमागरम फापडा, मिरची भजी, समोसे व कचोरी तळले जात होते. आम्ही नाश्ता केला नव्हता . त्यामुळे नवऱ्याने मिरचीवडा, फापडा, समोसा व कचोरी हे सगळेच पदार्थ बांधून आणले. सर्व पदार्थ गरमागरम होते. कचोरी बोटाने मोडली तर वाफ बाहेर आली. फापड्यासोबत कांदा,काकडी,टोमॅटो व मिरची बारीक कापून मिक्स करुन दिले होते. काय जबरद्सत चव होती सगळ्यांची!मी आयुष्यात खालेल्ले सर्वात उत्तम समोसा,कचोरी,मिरचीवडा व फापडा होता हा!त्यावर मस्त चहा घेतला. पुढे अर्ध्या तासातच आम्ही चित्तौडगडला पोहोचलो.

     बस स्टॅंडवर उतरताच एक रिक्षावाला गड फिरवण्यासाठी 600 रु. ला फिक्स केला. त्याच्याच ओळखीचा एक गाईड त्याने आम्हाला 400 रु.ला ठरवून दिला. सामान कुठेतरी ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्याच ओळखीच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही सामान ठेवले. हे एक AC रेस्टॉरंट होते. इथे पोटभर नाश्ता करुन गड फिरायला निघायचे ठरवले. कारण 3-4 तास सहज लागणार होते. आम्ही तेथे पराठ्यांचा मजबूत नाश्ता केला व चितौडगढ पहायला सुरुवात केली. संपूर्ण चित्तोडगड किल्ला पायी पाहायला 2-3 दिवसही पूरणार नाहीत. तथापि गाईड काही महत्वाची निवडक ठिकाणे दाखवतात. ही ठिकाणे पाहण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. प्रत्येक वास्तुच्या दारापर्यंत रिक्षा जात असल्याने येथे पायपीट काही फारशी करावी लागत नाही.

     आता चितौडगडबद्दल थोडेसे. "गढ मैं है गढ चित्तौड, बाकी सब है गढैय्या!" अशी म्हण चित्तोडगडवासी अभिमानाने सांगतात. चित्तौडगड हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील मानवी वस्ती असलेला (जिथे माणसांची घरे आहेत व अजुनही राहतात.) सर्वात मोठा किल्ला आहे. . हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा किल्ला पांडवकालीन आहे, मौर्यांनी बांधला असे अनेक सिद्धांत आहेत. हा किल्ला प्रथम चित्रांगद मौर्य याने बांधला. त्या वरुन या जागेचे नाव प्रथम चित्रकूट व मग पुढे चितौडगड असे झाले.

     तथापि याचा खरा इतिहास इ.स. 730 ला बाप्पा रावळ यांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हापासून सुरु होतो. बाप्पा रावळ हे असे महापराक्रमी राजा होते की त्यांनी अफगाणपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता व त्यानंतर 400 वर्षे कुणाही अफगाणीची/त्या प्रदेशातून भारतावर आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही! या किल्याची परकीय आक्रमकांनी अनेकवेळा तोडफोड केली. परंतू राजपूतांनी ताबा मिळवल्यावर पुन्हा पुन्हा बांधून उभा केला आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 700 एकर किंवा त्याहून अधीक आहे. किल्ल्याला भैरव पोल, पदन पोल, हनुमान पोल, गणेश पोल, जोरला पोल, राम पोल आणि लक्ष्मण पोल(म्हणजे दरवाजा) अशी सात दरवाजे आहेत. किल्ल्यातील प्रमुख वास्तूंमध्ये कीर्ती स्तंभ, विजय स्तंभ, पद्मिनी पॅलेस, गौमुख जलाशय, राणा कुंभा पॅलेस, मीरा मंदिर, जोहरस्थल, जैन मंदिर आणि फतेह प्रकाश पॅलेस यांचा समावेश आहे.
चला तर मंडळी .....आता चितौडगड पाहूयात !!

पोल फोटो......

.

.

गडावर पोचल्यावर खालील गावाचे नयनरम्य दृश्य...

.

.

प्रथमत: राणा कुंभ महाल

     तिकीट काऊंटर इथून जवळच आहे. येथे संध्याकाळच्या लाईट ॲड साऊंड शो चे तिकीट मिळते. शो संध्याकाळी 6.45 ते 7.45 असा असतो व रु.150+जीएसटी त्याचे तिकीट असते. जाताना पाहू असा विचार करुन आम्ही फक्त किल्ला पाहायचे प्रतिव्यक्ती रु.35 तिकीट काढले. या महालात आता काही पाहण्यासारखे नसून येथे केवळ भग्नावशेष उरले आहेत.
कुंभ महाल (संग्रहीत छायाचित्र)

.

आम्ही पुढे प्रस्थान केले.कुंभ श्याम मंदीर! (कुंभस्वामी मंदीर)
हे मंदीर राणा कुंभा यांनी इंडो-आर्यंन शैलीत निर्माण केले आहे. हे भगवान विष्णूला समर्पित असलेले मंदीर आहे. मंदिरामध्ये कृष्ण बलराम आणि राधा राणी यांच्या मूर्ती आहेत. मंदीरावर उत्कृष्ट कोरीव काम आहे.

फोटो

.

.

.

.

.

.

.

.

.

     कुंभ श्याम मंदीराच्या प्रांगणातच बाजुला संत मीराबाई व त्यांचे गुरु संत रोहीदास यांचेही मंदीर आहे. संत रोहीदास यांच्या पादुका आहेत.

.

      पादुकांच्या वरोबर वरती घुमटात पंचमुखी मूर्ती आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पाच शरीर असून एकच मूख आहे. हे पाच भाग पंचतत्वे यांचे प्रतिक आहेत. कोणत्याही बाजूने पाहिले तरी प्रत्येक शरीर परिपूर्ण दिसते.
फोटो

.

मीराबाई मंदीर ....

     संत मीराबाई चित्तौडगड येथे राहत होत्या. परंतू त्यांच्यावर विषप्रयोग झाल्यावर त्या येथून निघून गेल्या. इथे गिरीधर गोपालस्वरुप मूर्ती आहे. मीराबाईच्या मंदिर मध्ये दिसत असणारी मूर्ती ही आता नव्याने बसवण्यात आली आहे. मूळची राजा भोज याने स्थापन केलेली मूर्ती होती. ती हलदी घाटीचे युद्ध संपल्यावर मानसिंग जाताना येथे आला आणि इथली मूळ कृष्णाची मूर्ती त्याने आमेर किल्ल्यातील गज शिरोमणी मंदिर येथे नेऊन स्थापना केली.
फोटो

.

.

इथून पुढे आहे ते त्रिमूर्ती मंदीर....

     हे 1000 वर्ष पूर्वीचे मंदिर आहे. राजा भोज याने 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. अल्लाउद्दीन खिलजीने याची तोडफोड केली. नंतर चौदाव्या शतकात राजा मोकल याने 1428 मध्ये याची पुनर्निर्माण केले. याला समाधीश्वर मंदिर असेही म्हणतात. मूर्ती नऊ फूट उंच आहे. एकाच दगडामध्ये त्रिमूर्ती कोरलेले आहेत. मंदिराचा मागचा भाग जो आहे तो जगन्नाथ पुरी सारखा आणि पुढील भाग जो आहे तो सोमनाथ मंदीरसारखा याप्रमाणे रचना केली आहे. हे मंदीर ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे मंदीर आहे. मंदीरावर अप्रतिम कोरीवकाम आहे.
फोटो....

.

.

     मंदीराच्या समोर नंदीमंडप असून त्यावरील कोरीवकामही देखणे आहे.
फोटो

.

ब्रम्हदेवाचे मंदीर असल्यामुळे पाया हा कमळाच्या नक्षीचा आहे. तसेच त्यावर हत्ती कोरलेले आहेत(फोटोत हत्तींच्या सोंडा तोडलेल्या दिसतात).

.

     अश्वमेध यज्ञाचे दृश्य ....घोडा व लवकुश

.

     त्या काळी नर्तीका जे नृत्य करत त्यांच्या मुद्रा कोरलेल्या आहेत.
फोटो

.

.

     नर्तिका ज्या दागिने व अलंकार धारण करत त्यांचे डिझाईन या फोटोत आडव्या खांबांवर कोरलेले दिसते.

फोटो

.

     या सुंदर मंदीराला दृष्ट लागू नये म्हणून हा एकमेव काळा दगड आहे. खांबांवर नर्तीका मुद्रा दिसत आहेत.

फोटो

.

बाजूलाच असलेले गोमुख तीर्थ

.

इथून पुढे आपणास दिसते ते जोहरस्थळ.

     हे जे लोखंडी ग्रीलच्या आतला पूर्ण भाग आहे, तो जोहर स्थळ म्हणून आता ओळखले जाते.

.

इथे आधी 40 फूट खोल खड्डा खणला जायचा आणि त्याच्यात लाकडं व तेल टाकले जायचे. अग्नी प्रज्वलित करुन स्त्रिया यामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायच्या ज्याला जोहर असे म्हटले जाते.

.

     इतिहासात तीन मोठे जोहर झाले व त्यात एकूण 26000 स्त्रियांनी परकीय आक्रमकांच्या हाती लागून शील भ्रष्ट होऊ नये म्हणून अग्नीस्नान केले. पहिला जोहर झाला राणी पद्मावतीच्या नेतृत्वाखाली इ.स. 1303 ला अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले होते तेव्हा 16000 स्त्रियांनी, दुसरा 1535 ला बहादुर शहा च्या आक्रमणाच्या वेळी राणी कर्णावती हिने 13000 स्त्रियांच्या सहित जोहर केला, तिसरा जोहर अकबराने आक्रमण केले त्यावेळी राणी फूलकंवर हिच्या नेतृत्वाखाली 7000 स्त्रियांनी जौहर केला . पुरातत्व खात्याने या जागेत उत्खनन/संशोधन केले असता हाडे, कवट्या, दागिने व काही तत्सम गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या व ही जागा जौहरस्थळ असल्याचे सिद्ध झाले.

जोहरस्थळाच्या बाजूलाच विजय स्तंभ आहे.

.

     1448 मध्ये मेवाडचा राजा राणा कुंभ याने महमूद खिलजीच्या माळवा आणि गुजरातच्या संयुक्त सैन्यावर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी बांधला होता. विजयस्तंभ हे चित्तौडगडच्या आकर्षक वास्तूंपैकी एक आहे जे 1458 ते 1468 या काळात बांधले गेले गेले. याचे 9 मजले असून हे नवग्रहांवर आधारीत आहे. राशींची चिन्हे यावर कोरलेली दिसतील. विजय स्तंभामध्ये सर्व धर्माच्या मूर्तींचा समावेश आहे. 122 फूट उंच आहे आणि आत मध्ये 127 पायऱ्या आहेत. खालून पसरट, मध्ये निमुळता आणि वरून परत पसरट अशाप्रकारे डमरूच्या आकारासारखा हा बनवला आहे. तिसऱ्या व आठव्या मजल्यावरती अल्ला, खुदा हा शब्द लिहिला असल्यामुळे त्याची तोडफोड केली गेली नाही. इतर सर्व मुर्तींची तोडफोड करण्यात आली आहे.यावर अद्भूत कोरीवकाम आहे.

फोटो

.

.

इथून पुढे आम्ही कालिका मंदीरात गेलो

     हे पूर्वी सूर्यमंदीर होते. तथापि परकीयांच्या आक्रमाणात हे उद्ध्वस्त झाले. आता तेथे कालिकादेवीची प्रतिष्ठापना केली आहे.

फोटो

.

इथून पुढे आम्ही गेलो राणी पद्मावतीच्या महालात..

.

     राणी पद्मावतीच्या महालाचे दोन भाग आहेत. एक नेहमीची वास्तू जी तलावाकाठी आहे. दुसरी जी तळ्याच्या मध्याभागी असून येथेच खिलजीने तीचे प्रतिबिंब पाहिले असे म्हणतात परंतु या बद्दल वाद आहेत.. तळ्याच्या मध्याभागी असलेला महाल हा पाहुण्यांकरीता वापरला जात असे, तीथे राणी पद्मिनी राहत नव्हती असेही मानले जाते.
फोटो

.

यानंतर आम्ही गेलो सूरज पोल येथे..

     त्या काळात युद्धातील हत्ती धडका देऊन दरवाजा तोडत असत. त्यांना तो तोडता येऊ नये म्हणून या दरवाजावर अणकूचीदार लोखंड आहे..

फोटो

.

      सुरज पोल येथे आता जो अणकूचीदार दरवाजा दिसत आहे हा नंतर बसवलेला आहे. फतेहपुर सिक्री येथे जो बुलंद दरवाजा आता महणून आपण पाहतो तो मूळ दरवाजा सूरजपोल येथील होता. तो अकबराने इथून नेला आणि फतेहपूर सिक्री येथे बसवला.

फोटो
.

      याच गेटमधून राणा रतन सिंग रावळ अल्लाउद्दीन खिलजी यांस निरोप देण्यास गेला असता शेवटच्या पोलपाशी खिलजीने राणा रतन सिंग रावळ यास दगाबाजीने बंदी बनवून नेले.

फोटो
.

      येथे काही संदर दृश्ये दिसतात. अरवली पर्वताचा एका झोपलेल्या माणसाच्या आकारासारखा पर्वताचा भाग दिसतो.

.

खाली गावाचा सुंदर नजारा दिसतो.
फोटो

.

.

इथून किर्तीस्तंभ पहावयास गेलो

     कीर्तिस्तंभ हा 22 मीटर उंच स्तंभ 12 व्या शतकात बांधण्यात आला होता. रावल कुमार सिंह यांच्या कारकिर्दीत जैन धर्माला किर्तीमान करण्यासाठी हा स्तंभ एक जैन व्यापारी भार्गवाला यांनी बांधला होता. जैन धर्माच्या अनेक अनुयायांकडून कीर्तिस्तंभ हे प्रमुख जैन तीर्थक्षेत्र मानले जाते. या स्तंभावर जैन धर्माची शिल्पे कोरलेली आहे.
फोटो

.

जैन मंदीर

.

     इथून जात असताना चित्तौडगड येथील तत्कालीन अत्यंत भरभराटीस असलेला कापड तयार करण्याचा कारखाना दिसला.
फोटो

.

      त्यानंतर आम्ही तेथील गव्हरमेंट म्युजियम मध्ये गेलो. इथे गाईडने आम्हाला चंदनाचा लेप असलेली साडी व औषधी रजई पाहावयास नेले.( जी इथेच मिळते असे त्यांचे म्हणणे होते. ) चंदनाचा लेप असलेल्या साडीला मस्त चंदनाचा दरवळ येत होता. साडी 2000 रु. पासून सुरुवात म्हणल्यावर मी परत ठेवणार होते. परंतू नवऱ्याने ही साडी माझ्याकडून तूला ‘पाडव्याची भेट’ म्हणल्यावर मी पडत्या फळाची आज्ञा समजून घेऊन टाकली! ही साडी 4 वर्षानंतर वापरायची नसल्यास परत पाठवून द्या. 50 टक्के पैसे परत मिळतील असे सांगून बील मिळाले.

त्यानंतर येथील सर्वात शेवटचे आकर्षण फतेह प्रकाश पॅलेस येथे आलो.

.

.

      हा राजवाडा महाराज फतेह सिंग यांनी बांधला व त्यांचे येथे वास्तव्य होते. ही अत्यंत देखणी वास्तू असून आत मोठे संग्रहालय आहे. येथे अनेक नकाशे, पुतळे, शस्त्रास्त्रे व प्रतिकृत्या यांचे दालन आहे. हे सर्व पाहण्यात तास-दीड तास सहज जातो. खूपच सुंदर संग्रहालय आहे.

फोटो

.

.

.

.

.

.

बंदूकांचा आकार पहा.

.

.

.

जहांगीरकालीन चिलखत

.

.

.

      बाहेर येताच तेथे राजप्रासादाच्या प्रांगणात प्रतिव्यक्ती 100 रु. देऊन आम्ही घोडेस्वारी करण्याचा आनंद लुटला. आता दुपारचे 4 वाजत आले होते.
फोटो

.

     आम्ही परत आमच्या रेस्टॉरंट वर आलो. नवऱ्याने मोबाईल वाय-फायला जोडून घेतला. चित्तौडगड, कुंभलगड इथे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यादिवशी भारत पाकिस्तान 20-20 मॅच होती. नवऱ्याला ती अजिबात चुकवायची नव्हती. त्यामुळे त्यांनी मोबाईल सुरू केला व मॅच संपेपर्यंत मी व माझा मुलगा काहीबाही पदार्थ ऑर्डर करुन खात बसलो. शेवटी विराट कोहलीने फ्री हिट (कि नो बॉल? )वरती 2-3 रन्स पळून काढून ती ऐतिहासिक मॅच जिंकून दिली व आमची सुटका झाली. साधारण सात वाजले होते. रात्री 11 टी ट्रेन असल्याने टाईमपास करणे भाग होते. संध्याकाळचा लाईट ॲन्ड साऊंड शो आम्ही नाही पाहिला कारण इतिहासाचा नाही म्हणलं तरी ओव्हडोस झाला होता. नवीन काही पाहायला मिळणार नव्हतं. शेवटी आम्ही तेथीलच एका स्थानिक बागेमध्ये फिरावयास गेलो. तिथे मुलगा तासभर खेळत होता. छान टाईमपास झाला.
फोटो

.

     स्थानिक मार्केटमध्ये दिवाळीचा बाजार भरला होता तेथे फेरफटका मारला. साडेनऊ-दहा वाजताच आम्ही रेल्वे स्टेशन वरती पोहोचलो. अकरा वाजेपर्यंत ट्रेन येताच मुंबईकडे रवाना झालो. मुंबईमध्ये आम्ही दुसरे दिवशी दीडच्या सुमारास पोचलो त्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. लक्ष्मीपूजनाची तयारी करायची होती. कुंभलगडवरुन हल्दीघाटीकडे जात असताना वाटेत आदिवासी मुले सिताफळे विकतात. अगदी ५०-६० रुपयात डझनभर फळे मिळाली होती. त्याचीच आरास करुन फायनली वेळेत लक्ष्मीपूजन करून आमच्या या ट्रीपची यशस्वी सांगता झाली!

फोटो
.


तुम्ही माहितीसुद्धा अगोदर मिळवली होती. फोटो सुरेख आलेत आहेत. दोन तीन नवीन जागा कळल्या.
"इतिहासाचा नाही म्हणलं तरी ओव्हडोस झाला होता." हे खरंय. आमच्या कोटा-बुंदी-चितोडगढ-उदयपूर ट्रिप मध्ये हेच झालं. आता महाल नकोच.
बोटिंगची आवड नसल्याने ते टाळलं आणि सिटी पॅलेस ते प्रताप स्मारक हे अंतर तलावांच्या काठाने चालत (पेंडसे वाचवले) गेलो. वाटेत एक परदेशी वयस्कर बाई (६०~) भेटली व ती विचारत होती की अजून किती अंतर आहे . पण तिला इंग्रजीचा गंध नव्हता. बोटं दाखवून,घड्याळ दाखवून "अर्धा तास" सांगण्यात बराच वेळ गेला. प्रताप पाहण्याच्या वर्षांचं कुणी नव्हतं म्हणून गाळला. ओटोने सहेलियों की बाबी गाठली.

{ बुंदीहून रेल्वेने} चितोडगढ स्टेशनला आल्यावर. एका ओटोने बस स्टँडला आलो तेव्हा ड्रायवर बोलला की उद्या चितोढगढ पाहायचा असेल तर साडेचारशे रु सात ते अकरा दाखवेन आणि मीच गाईड. ( २०१३) संध्याकाळी फोन करून सांगा.
हॉटेल रुम चोवीस तासाने मिळाल्याने एका दिवसांत काम झाले.
कीर्ती स्तंभ, विजयस्तंभ फोटो फारच सुंदर.
मुलाला ट्रिप फार आवडलेली दिसते आहे.
______________
माउंट अबूला गेल्यास तिथे स्थानिक लोकांचे मार्केट वेगळे आहे तिथे जा. ( पर्यटक जात नाहीत.) तिकडे स्वस्त कपडे मिळतात. रबडीही चांगली कढईतली तयार मिळते.

राजस्थानातील प्राचीन मंदिरे ह्यांनाच प्राधान्य असेल. राजवाडे बघण्यात फारसा रस नाही. बरोबर आहे. आपापल्या आवडीनुसार स्थलदर्शन करावे हेच खरे. तरीही उदयपूरमधले राजवाडे हे संग्रहालयदेखील असल्याने गाईडसोबत हे सर्व पाहणे हा एक अभ्यासपूर्ण अनुभव ठरला. भविष्यात राजस्थानात अन्य ठिकाणी आता यापुढे आम्हालाही कदाचित राजवाडा पाहणे कंटाळवाणे ठरु शकते.
उदयपूरपासून वाळवंट किती दूर? मला त्या सॅण्ड ड्युन्स बघायची इच्छा आहे. उदयपूरपासून जैसलमेर ५०० कि.मि. दूर आहे. थेट ट्रेन नाही. तथापि जोधपूरवरुन ट्रेनने ८ तास लागतात. त्यापेक्षा पुणे/मुंबई येथून थेट जैसलमेरला गेलेले बरे. ४ दिवसांची मस्त ट्रीप होऊ शकते. मीही राजस्थानचा हाच भाग भविष्यात पाहणार आहे कधीतरी. सर्वात शेवटी जयपूर, अजमेर, पुष्कर इ. पाहणार असे ठरवले आहे.

पुणे ते भगतसिंग की कोठी(जोधपूर) ही ट्रेन योग्य आहे. तिथून जोधपूर - बारमेर -जैसलमेर -बिकानेर ही वाळवंटी सहल आखता येईल.
बिकानेर -शेखावटी -दिल्ली -विमानाने परत हेसुद्धा वाढवता येईल.

आग्रा (ताज,लाल किल्ला)- फतेहपूर सिक्री अकबराचे शहर-भरतपूर (पक्षी अभयारण्य)-अलवार -दीग-(चित्रे,महाल) झुनझुनु (हवेल्या) -रेवारी-दिल्ली ही एक सहल आवडेल.

सवाईमाधोपूर(रणथंबोर)-कोटा-झालावार(सूर्यमंदिर)/बुंदी(किल्ला आणि चित्रे)-चितोडगढ (शिल्पे आणि गड इथे आलेच आहे) ही एक सहल.

Everyman guide series -भरपूर चित्रांसह नकाशे,इतिहास देणाऱ्या मालिकेने भारतात फक्त राजस्थानवरच पुस्तक काढले आहे. (२०पौंड)

तुम्ही माहितीसुद्धा अगोदर मिळवली होती. - त्यात तुमचाही वाटा आहे, हे नम्रपणे नमुद करु इच्छिते.
आता महाल नकोच.
बोटिंगची आवड नसल्याने ते टाळलं
 - नवऱ्यालाही व मलाही फारसा बोटींगमध्ये इंटरेस्ट नाही पण मुलाचाही विचार करणे भाग होते अन्यथा त्याला कंटाळवाणे वाटले असते. नवऱअयाने आता सांगितले आहे की पुढच्या वेळी थंड ठिकाणी जायचे नियोेजन कर. जिथे फक्त निसर्ग असेल.
ड्रायवर बोलला की उद्या चितोढगढ पाहायचा असेल तर साडेचारशे रु सात ते अकरा दाखवेन आणि मीच गाईड
चित्तौडगडला गाईड स्थानिकच आहेत. त्यांचा इतिहास सांगण्यावर भर असतो. परंतु कोरीव कामाबद्दल फारशी माहिती नसते. त्यांना २ ते २.५ तासाच एक गिर्हाईक संपवायचे असते. तरी आमच्या गाईडने आमच्यासाठी चार तास न कंटाळता दिले. त्याने सांगितले की कोरीव कामाची विस्तृत माहिती घेण्यासाठी तुम्हाला एखादा तज्ञ गाठावा लागेल. इथल्या गाईड लोकांचा माहिती सांगण्याचे ठरलेले असते. महत्वाचे तेवढेच सांगतात. परंतू इथल्या वास्तूंवरचे कोरीव काम अप्रतीम आहे. त्यावर भर देणारा गाईड शोधणे अवघड आहे.
मुलाला ट्रिप फार आवडलेली दिसते आहे.
हो. त्याला सहल अतीशय आवडली. त्याने न कंटाळता संग्रहालय व सर्व गडही तीतक्याच आवडीने पाहिले. त्याला चालायचा कंटाळा नसल्याने तो सर्व ठिकाणी उत्साहाने फिरला. कुंभलगड आम्ही थांबत थांबत चढलो पण तो मात्र सहज चढून गेला. प्रत्येक दिवसाच्या कार्याक्रमात त्याला आवडणारे काहीतरी असेल याची मी काळजी घेत होते. त्याला पुन्हा उदयपूरला जायचे आहे असे तो अजूनही सांगत असतो.

"तालों मे नैनिताल, बाकी सब तलैया" ह्या नैनितालवासींच्या म्हणीवर आधारित प्रसिद्ध गाणे आहे, पण नैनिताल पाहिल्यावर त्यात अतिशयोक्ती असल्यासारखे वाटते 😀
पण

"गढ मैं है गढ चित्तौड, बाकी सब है गढैय्या!" अशी म्हण चित्तोडगडवासी अभिमानाने सांगतात.


हे मात्र अगदी सार्थ वाटते! ५९० फुट उंचीच्या टेकडीवर, ६९२ एकर क्षेत्रफळ व्यापणारा चित्तोडगड कसला अवाढव्य आहे ... पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते. विजयस्तंभ आणि मीरा मंदिर ह्या माझ्या तिथल्या सर्वात आवडत्या वास्तु!
जवळपास दिड वर्षापुर्वी प्राचीन वास्तुं विषयीच्या एका फेसबुक ग्रुप वर कुंभलगड आणि चित्तोडगड वर हे लघुलेख लिहिले होते त्यांची आठवण आली ही मालिका वाचताना!

छान झाला प्रवास आणि मालिका... मजा आली वाचायला! पुढिल भटकंती आणि लेखनास शुभेछा 👍

पुणे ते भगत की कोठी(जोधपूर) ही ट्रेन योग्य आहे. तिथून जोधपूर - बारमेर -जैसलमेर -बिकानेर ही वाळवंटी सहल आखता येईल.
बिकानेर -शेखावटी -दिल्ली -विमानाने परत हेसुद्धा वाढवता येईल.

१००% सहमत.

जोधपूरला मिर्ची बोंडा,मावा कचोरी.
खरेदी करायची असेल तर त्रिपोलीया बाजारात करावी. सरकारी अथवा रिक्षावाल्याने दाखवलेल्या दुकानात करू नये.

बारमेर ला बांधणीच्या चादरी,साड्या व ड्रेस चांगले स्वस्त मीळतील.
याच भागात चांदीची अॅन्टीक ज्वेलरी सेट मीळतात पण बघून घ्यावेत.

भटकंती व वर्णन वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरेच वेळा ट्रेनिंग, एक्सरसाईज करता राहिल्यामुळे संपुर्ण भाग बघून झाला.

मालिका आपण खुपच सुदंर लिहीली आहे.

iternary
उदयपूर
दिवस १ - १)जगदीश मंदीर 2)सिटी पॅलेस 3)लेक पिचोला बोट राईड किंवा ४)करणी माता मंदीर (५ च्या सुमारास वर जावे व सूर्यास्त आवर्जून पहावा. रोप वे आहे.)
दिवस २ - १)सहेलियोंकी बाडी २) मोती मगरी 3)फतेहसागर लेक 4)बगोर की हवेली शो (चूकवू नये)
दिवस ३ - 1)कुंभलगड २) हल्दीघाटी-राणा प्रताप म्युजिअम, चेतक घोडा समाधी व रक्ततलाई(ऑप्शनल) ३) सहस्त्रबाहु मंदीर (मस्ट आहे. २ तास काढून जावे) 4)एकलिंगजी मंदीर (सर्वात शेवटी करावा.) उदयपूर परत
दिवस ४ - उदयपूर-चितौडगड (बस/कारने जावे) चित्तौडगड - राणा कुंभ महाल,कुंभ श्याम मंदीर, मीरा मंदीर, त्रिमूर्ती मंदीर, गोमूख तीर्थ, जोहर स्थळ, विजय स्तंभ, कालिका मंदीर, किर्ती स्तंभ, जैन मंदीर, फतेह प्रकाश पॅलेस व सायंकाळी लाईट ऑन्ड साऊंड शो. चितौडगडवरुन रात्री ट्रेनने मुंबईला परत.

येथे दिवस ३ ला उदयपूरला परत येण्याऐवजी कुंंभलगड येथे मुक्कामही करु शकता. संध्याकाळी तेथेही लाईट ऑन्ड साऊंड शो असतो. शिवाय जीप सफारीही आहे. परंतू तेथील जंगलात फार काही पाहण्यासारखे नाही. त्यामुळे आम्ही तो ऑप्शन गाळला.










No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...