Tuesday, August 13, 2024

हंपी संपुर्ण माहिती

 

हंपी

               बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हंपी दौरा, प्रथम त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या शहरापासून १३ किमी अंतरावर असलेले हंपी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आजही हंपीच्या सभोवतालच्या परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास एका क्षणात आपल्याला त्याकाळातील आठवण करून देतो.
हंपीतील प्रसिद्ध दगडी रथ
          काल रात्री हंपीला पोहोचल्यावर पटकन जेवून झोपलो कारण आज मातंगा पर्वतावर सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठायचं होतं. ठरल्याप्रमाणे पहाटे ५ वाजता उठून मातंगा पर्वत चढायला सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासात वर पोहोचलो पण ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही दिसला नाही पण विरुपक्ष मंदिराजवळून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे अप्रतिम दृश्य नजरेस पडले.
हंपी 
           ते दृश्य कॅमेरात टिपून पुन्हा दिवसाच्या नव्या सुरवातीला लागलो पूर्ण दिवस हंपीमध्ये फिरायचा असल्याने दिवसभरासाठी एक सायकल घेतली.
                   
अच्युतराया मंदिर
           मातंगा पर्वताच्या पायथ्याशी असलेले ह्या मंदिराचे निर्माण इ स १५१३ ते १५३९ मध्ये कृष्णदेवरायचा छोटा भाऊ अच्युतरायच्या कारकिर्दीत झाले म्हणून ह्या मंदिरास अच्युतराय मंदिर म्हणून संबोधले जाते मंदिरावरील कोरीवकाम अगदी रेखीव आहे काही ठिकाणची पडझड झाली असली तर हे मंदिर सौंदर्याची एक छाप आपल्यावर सोडून जातेच.
 
अच्युतराया मंदिराचा आवार 
मंदिराचे प्रवेशद्वार

बाजारपेठ
मंदिरावरील कलाकृती
एकशिला नंदी
      अच्युतराया मंदिरातून बाहेर आल्यावर विरुपक्ष मंदिराकडे जाताना वाटेत उजव्या हाताला आपल्या एक दगडात कोरलेला एक नंदी नजरेस पडतो त्यास एकशिला नंदी म्हणून संबोधले जाते.
एकशिला नंदी 
कडेलकालु गणेश
         भारताच्या दक्षिणेकडील भागात अस्तित्वात असलेल्या भगवान गणेशांच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी कडेलकालू गणेश हि एक आहे. हंपीच्या हेमकुटा टेकडीच्या उतारावर कडालेकलु गणेशमूर्ती असलेले हे मंदिर आहे. कडेलकालू गणेश या पुतळ्याची उंची ६.६ मीटर (१५  फूट) असून हि मूर्ती एका विशाल दगडात कोरली गेली आहे. ह्या  गणेशाचे पोट अशा प्रकारे बनवले गेले आहे. म्हणूनच, या मूर्तीला कडालेकलू गणेश असे नाव देण्यात आले आहे. हंपी येथे अस्तित्त्वात असलेल्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे
कडेलकलू गणेश मंडप
कडेलकालु गणेश
सासेवकालू गणेश
         कडेलुकलु गणेशासारखेच अजून एक मूर्ती हंपीच्या दक्षिणेस नजरेस येते त्याच नाव म्हणजे ससेवकालू गणेश. १२ फूट उंचीच्या ह्या मूर्तीचे निर्माण सुद्धा एकाच दगडात करण्यात आले आहे.
             हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान गणेश अन्नावर प्रेम करतात म्हणून ओळखले जातात. एकदा गणेशाने भरपूर भोजन केले, त्यामुळे त्याचे पोट फुटण्याच्या मार्गावर होते. पोट फुटण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय न सापडल्याने गणेशने साप पकडला आणि त्याला पोटास बांधले. गणेशाच्या पोटाभोवती बांधलेल्या सापाच्या अस्तित्वामागील ही पौराणिक घटना आहे, जी मूर्तीवर दिसते.
ससेवकालू गणेश मंडप 
 
बडवलिंग
         बडवलिंग हि हंपीमधील ही सर्वात मोठी शिवलिंग प्रतिमा आहे. लक्ष्मी नरसिंह पुतळ्याशेजारी शिवलिंग समोर एका खोलीत ठेवलेले आहे. या चिन्हावर बारकाईने पाहिले तर त्यावर तीन डोळे कोरले आहेत  पौराणिक कथेत असे आहे कि  ह्या शिवलिंगाचे निर्मिती एका  गरीब स्रीद्वारे केली असल्याने त्यास बडवलिंग शिवलिंग म्हणून ओळखले जाते. 
बडवलिंग
लक्ष्मी नरसिंह मंदिर
            भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी नरसिंह हा एक आहे हंपीमधील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. नरसिंह सात फणी शेषनागावर बसले आहे. सापांचे डोके त्याच्या डोक्यावर छत्राप्रमाणे कार्य करत आहेत . रागीट आणि उग्र डोळ्यांमुळे ह्यास उग्रनरसिंह म्हणून संबोधले जाते
मूळ मूर्तीमध्ये नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मी देवीची सुद्धा प्रतिमा होती परंतु विजयनगरावर झालेल्या आक्रमणामुळे ह्या मूर्तीचे गंभीर नुकसान झाले आहे. त्याच्या मांडीवर कोरलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचा तोडलेला भागही गहाळ आहे. कदाचित हे लहान तुकडे केले असेल. पण देवीचा हात आजही आपणास निदर्शनास येतो
लक्ष्मी नरसिंह
QUEEN'S Bath
         अच्युतरायाने विजयनगरातील राजघराण्यातील महिलांसाठी क्वीन बाथ नामक वास्तू बनवल्याचे समजते. इंडो-इस्लामिक शैलीमध्ये तयार केलेली, क्वीन्स बाथ एक विस्तृत रचना आहे ही आयताकृती इमारत असून इमारतीच्या चारही बाजूस बाल्कनी आहेत, प्रत्येकाला बाल्कनीला तीन खिडक्या आहेत. तलावाची खोली ६ फूट आहे आणि उतरण्यासाठी दगडांच्या पायर्‍याची सोय आहे.
                सदर तलावाची रचना ही ३० चौरस मीटर असून  तलावापर्यंत पोचण्यासाठी संरचनेसारखा पूल बनविला गेला आहे.  बहुधा राणी साहेब आंघोळ करत असताना लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अशी युक्ती केली असावी. तलावापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याची रचना सुद्धा वेगळ्याप्रकारे करण्यात आली आहे.

QUEEN'S Bath
पुष्करणी
         हंपीतील पुष्करणी म्हणजे पवित्र पाण्याची टाकी असून ती मंदिरांना जोडलेली आहे. हंपीतील बहुतेक मोठ्या मंदिरांमध्ये जवळच पुष्करणी बनविली आहेत. पवित्र टाक्या मंदिरे आणि मंदिरांच्या आसपासच्या लोकांच्या विविध विधी आणि कार्यात्मक बाबींसाठी पुष्करणीचा उपयोग होत असे. पुरातन काळात हंपीच्या लोकांकडून या टाक्या पवित्र जागा मानल्या जात असत. आजही विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी हंपीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पुष्करणींचे मोठे आकर्षण आहे.
पुष्करणी
महानवमी दिब्बा
       महानवमी दिब्बा हि एक विजयी वास्तू आहे. उदगिरीवर विजय मिळाल्यानंतर राजा कृष्णदेवरायांनी ह्या वस्तूची निर्मिती केली होती ह्याची रचना हि हंपीच्या राजवाड्यांमधली सर्वात उंच रचना आहे ह्या वास्तूच्या उंचीमुळे हि प्रसिद्ध आहे. विजयोत्सव साजरा करण्यासाठी ह्या वास्तूचा उपयोग होत असे. ह्या वास्तूच्या चहूबाजूस भिंतीवर विविध शिल्पे अधोरेखित केली आहे ती ह्या विजयाची साक्ष देतात. महानवमी डिब्बा च्या आजूबाजूस हत्ती घोडे बांधण्यासाठी वेगळी जागा अधोरेखित करण्यात आली आहे, बाजूलाच राजा व प्रधान ह्यांच्या गुप्त चर्चेसाठी एक गुप्तखोलीसुद्धा आहे महानवमी डीब्बाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.


हत्तीच्या पायदळी देण्यात येणाऱ्या शिक्षा
महानवमी दिब्बा
हजाररामा मंदिर
           शाही राजवटीच्या मध्यभागी असलेले हजारारामा मंदिर हंपीचे मुख्य आकर्षण आहे. हे स्थान फक्त समारंभांसाठी वापरले जात होते आणि रामायणातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे प्रतिनिधित्व करणार्‍या कलाकृतींसाठी हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित केलेले हे मंदिर हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या भिंती १५ व्या शतकाच्या कलेने सुशोभित आहेत. चार कोरलेल्या ग्रॅनाइट स्तंभ अर्ध-मंडपच्या सौंदर्यात भर घालतात. हजारा रामा मंदिरात भेट देणारे पर्यटक पूर्वीच्या राजांच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या वास्तू व सांस्कृतिक वारशाचा शोध घेऊ शकतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरीवकाम या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.



ग्रॅनाईट स्तंभावरील कोरीवकाम
रामायण महाभारतातील प्रसंग
पाताळेश्वर शिवमंदीर (Underground shiva mandir)
          पाताळेश्वर शिवमंदीर हे जमिनीपासून खाली असल्याकारणाने ह्यास पाताळेश्वर शिवालय म्हणून संबोधले जाते पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरास आत जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. पाताळेश्वर शिवालयाची निर्मीती ही पहिल्या बुक्कराय ह्यांच्या काळात झाली. मंदिराची रचना ही प्रांगण आणि गर्भगृह अशी करण्यात आली आहे मंदिराच्या गर्भगृहात नंदी व शिवलिंग असून पावसाच्या पाण्यामुळे आतील शिवलिंगाचे दर्शन सुद्धा होत नाही पण बाहेरील नंदीचे मुख दृष्टीक्षेपात पडते.


पाताळेश्वर शिवमंदीर
कमल महल (Lotus mahal)
        महानवमी दिब्याच्या उत्तरेस गेल्यास एक मैदान नजरेस पडते त्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास समोर कमळाच्या आकाराची एक वास्तू दिसते ती म्हणजे "कमल महल" त्यास कमल महल किंवा चित्रांगना महल म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कमल महल ही दुमजली वास्तू असून ह्याचं निर्माण हे इंडो-इस्लामिक पद्धतीने करण्यात आले आहे. महालाच्या उत्तरेस वरच्या मजल्यावर जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे. उन्हाळयात सुद्धा ह्या ठिकाणी थंड हवेचा वावर असे त्या उद्देशानेच कमळ महल चं निर्माण केलं गेलं आहे. थंडीच्या दिवसात हवेपासून बचाव होण्यासाठी म्हणून वरच्या खिडकीस पडदे लावण्याची सोय आजही दिसून येते.

कमल महल
गजशाळा  (ELEPHANT STABLE)
          गजशाळा ही वास्तू त्याकाळी राज्यांच्या हत्तीचे निवासस्थान म्हणून ओळखली जात. गजशाळेच्या ह्या वास्तुत एकूण ११ खोल्या असून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी प्रत्येक खोलीत छोटा दरवाजा आहे, गजशाळेच्या छताचा भाग हा गोलाकार आहे. गजशाळेच्या उत्तरेस असणारी वास्तू ही पहारेकऱ्यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जात.
 गजशाळा  (ELEPHANT STABLE)
Octagonal well
राजतुलाभार (KING'S BALANCE)
          राजतुलाभार  हि हंपीमधील एकमेव वास्तू जी आजही  लोकांना तिच्या इतिहासामुळे आकर्षित करते  ह्या वस्तूचा उपयोग १५ व्या शतकात  नवीन वर्ष , राज्याभिषेक , दसरा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण अशा खास दिवसांसाठी राजांचा तुलाभार करण्यासाठी होत म्हणून ह्यास राजतुलाभार म्हणून संबोधले जाते.
राजतुलाभार
विजया विठ्ठल मंदिर
           हंपीमधील तुंगभद्रा  नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित ह्या विठ्ठल मंदिराची निर्मिती १६ व्या शतकात झाली असून हे मंदिर विष्णूस समर्पित करण्यात आले आहे. विठ्ठल  मंदिर हे दुसऱ्या राज देवरायाच्या कारकिर्दीत  बांधले गेले असून हे मंदिर मूळच्या दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचे प्रतिनिधित्व करते 
            मंदिरावरील सुशोभित खांब व त्यावरील शिल्पांनी आजही पर्यटक प्रभावित होतात. मंदिरात विठ्ठलाची उत्कृष्ट  मूर्ती आहे पण सद्यस्थितीत  फक्त पुजारी येथे प्रवेश करू शकतात लहान गर्भगृह सर्वसामान्यांसाठी खुले आहे ह्या मंदिराच्या सभोवताली असलेला दगडी रथ हे सध्याचे प्रमुख आकर्षण आहे सध्या पन्नास रुपयाच्या भारतीय चलनावर ह्याच दगडी रथाची प्रतिकृती आहे.
 
 
दगडी रथ
विजया विठ्ठल मंदिर
             आजच्या दिवसाचा शेवट हा विजया विठ्ठल मंदिर बघून केला कितीही ठरवलं तरी ह्या वास्तू बघून मन भरत नाही पण वेळ पुढे पुढे जात राहते होणाऱ्या सूर्यास्ताचा विचार करून विजया विठ्ठल मंदिरातून काढता पाय घेतला व परतीच्या मार्गाला लागलो कारण पुढच्या दिवशीचा दौरा हा हंपीच्या दुसऱ्या बाजूस जायचं होता त्यामुळे वेलेतच हॉटेल मध्ये पोहोचलो आणि ठरल्याप्रमाणे मँगो रेस्टॉरंटमध्ये जेऊन त्यादिवसाची सांगता केली. 
दिन का साथी 
 टीप :-
१)  सर्वात पहिले सांगायचं झालं तर सिझन सोडून हंपी केलं तर हंपी बघण्यात एक वेगळी मजा आहे. पावसाळा पावसाळा संपता संपता केल्यास गर्दीसुदधा कमी असते आणि कमी गर्दीतच हंपी बघण्यात मजा आहे.
२) खर्च कमी करायचा असल्यास सायकल हा उत्तम पर्याय आहे १०० रुपयात दिवसभर सायकल मिळते ज्यात तुमची हंपीची सर्व ठिकाणं आरामात बघून होतात व सोबत गाईड घ्यावा.
३) लोटस महाल च तिकीट विजया विठ्ठल मंदिरास चालत त्यामुळे शक्यतो दोन्ही ठिकाण एकाच दिवशी करायचा प्रयत्न करावा.
४) सर्वात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी परतताना शक्यतो सूर्यास्ताच्या आताच परतावं कारण नंतर साधं वाटसरू सुद्धा हंपीच्या वाटेवर दिसत नाही.

दिवसभराचा खर्च :-
सायकल  :- १००/-
चहा नाश्ता :- ३०/-
जेवण :- १५०/-
गाईड :- ३५०/-
प्रवेश फी :- ४०/-
चहा :- २०/-
जेवण :- १५०/-
-----------------------
 एकूण :- ८४०/-

 

कर्नाटक भाग ४:- हंपीची दुसरी बाजू

         मागच्या भागात आपण पहिली ती हंपीची एक बाजू आजच्या भागात आपण पाहू ती हंपी ची दुसरी बाजू. थोडक्यात MONKEY HILL म्हणजेच अंजनेया पर्वत, पण तिथे भेट देण्यापूर्वी प्रथम बाजूला असलेल्या विरुपाक्ष मंदिरास प्रथम भेट दिली. विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील केंद्रस्थानी असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हि विरुपाक्ष मंदिराच्या दर्शनाने करून नंतर गाडी भाड्याने घेऊन अंजनेय पर्वताचा प्रवास सुरु केला.
विरुपाक्ष मंदिर
            हंपीमध्ये स्थित विरुपाक्ष मंदिर हे भगवान शिव आणि त्यांची संगीतमय देवी पंपा यांना समर्पित करून ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विरुपाक्ष मंदिर हे नऊ मजले व ५० मीटर उंच गोपुरम असलेले हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील हेमकुट टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीची आठवण करून देते. हे वीट आणि चुनखडीने बनलेले आहे. ह्या मंदिरास "पंपपती मंदिर" म्हणून देखील ओळखले जाते.  विरुपक्ष मंदिर हे ७व्या शतकाचे असून त्यावर कोरलेली कोरीव काम ९व्या व  ११व्या शतकातील आहे. सुरुवातीला या मंदिरात केवळ काही पुतळ्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता पण कालांतराने हे मंदिर एक विशाल इमारतीत रूपांतर झाले. १०व्या शतकात कृष्णादेवरायांनी रंग मंडप बांधला होता जो विजयनगरच्या स्थापत्यशैलीचे नेतृत्व करतो. आजही मंदिरात एक मानाचा हत्ती आहे ज्याची भक्त मनोभावे पूजा करतात.







मंदिरावरील कोरीवकाम
पुष्करणी


मानाचा हत्ती
अंजनेया पर्वत
              अंजनेया पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात किष्किंदा नगरीत पोहोचले, जिथे हा अंजनेया पर्वत आहे जेव्हा हनुमानाला कळले कि दोन राजकुमार आपल्या नगरीत आले आहेत तेव्हा हनुमानजी स्वतः श्रीराम व लक्ष्मणास भेटावयास आले. पौराणिक कथांनुसार श्रीराम व लक्ष्मण ह्यांची बजरंगबली सोबत झालेली पहिली भेट हि इथेच होय. अंजनी पर्वताकडे खालच्या बाजूने पाहिल्यास माकडाच्या चेहऱ्याची एक प्रतिकृती आपल्या नजरेस पडते म्हणून ह्यास "MONKEY HILL" म्हणून ओळखले जाते.
अंजनेया पर्वत

MONKEY HILL


हनुमानाचे जन्मस्थान


 
अंजनेया पर्वतावरून दिसणारे हंपीचे विलोभनीय दृश्य
निले गगन के तले 
सानापूर तलाव
          अंजनेया पर्वताच्या आजूबाजूला बघण्यास काय आहे? असं विचारल्यावर लक्षात आलं कि सानापूर तलाव हे जलसाठ्याचे एकमेव ठिकाण आहे म्हणून तिकडे जायचे ठरवले. अंजनेया पर्वताच्या सुमारे १० किमी पुढे स्थित "सोनापूर तलाव" हे ठिकाण आहे. तुंगभद्रा नदीतील पाण्याच्या साठ्यासाठी म्हणून ह्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. वाटेवरची काही गावे ओलांडून गेल्यावर एका चढावाच्या दिशेने गेल्यास अचानक हा तलाव समोर येतो. जोपर्यंत आपण जवळ पोहोचत नाही तोपर्यंत सोनापूर तलावाचा थांगपत्ता हि लागत नाही वर निळेभोर आकाश आणि त्याच आकाशात मोहून गेलेला निळाशार हा तलाव बघण्याची मजा हि काही औरच आहे.

सानापुर तलाव
पंपा सरोवर उर्फ मातंग तलाव
           रामायणात पंपा सरोवर म्हणजे आपण लहानपणी ऐकलेली शबरीची बोरे हि कथा ज्या ठिकाणी घडली तेच हे ठिकाण म्हणजे "पंपा सरोवर". राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात जेव्हा आले तेव्हा त्यांची भेट शबरीशी झाली व तिने प्रभू श्रीरामास सांगितले कि तुम्हाला सीतेचा शोध घ्यायचा असल्यास तुम्ही हनुमानाची मदत घ्या. किष्किंदा स्थित पंपा सरोवर हे अंजनेया पर्वताच्या बरोबर समोर आहे.

पंपा सरोवर 
             तुंगभद्रा नदीची दक्षिण बाजू बघून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना २ वाजल्याकारणाने भर उन्हात तुंगभद्रेचा पूल ओलांडताना एक निसर्गरम्य दृश्य नजरेस पडलं. चारही बाजूला दगडांचा खच, वरती निळेभोर आकाश, खाली नितळ तुंगभद्रेचे पात्र व मधोमध आपण. हंपीची हि एक आठवण नजरेत व कॅमेरात कैद करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो.
 तुंगभद्रा नदीवरील पूल 


निसर्गरम्य
             खरंतर तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने यायचा तर प्रवास १० मिनिटाचा आहे. पण नदीला पूर आल्याकारणाने गाडी घेऊन हे अंतर तब्बल २३ किमी होतं. पण आलो आहे तर सगळं करावं म्हणून गाडी घेतली पण आलो ते बरंच झालं, निदान रामायणाच्या वास्तूंचे एका अर्थाने साक्षीदारच झालो.
               हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडावेळ आराम करून विरुपाक्ष मंदिराच्या बाजूसच असणाऱ्या हेमकूट पर्वतावरून दिसणारा सूर्यास्त अनुभवण्यास गेलो.
 हेमकूट पर्वत
              विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस पर्वतावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो ते म्हणजे "हेमकूट पर्वत". हेमकूट पर्वत हंपीमधून सूर्यास्त बघण्यासाठीच उत्तम ठिकाण.हंपीमधील जवळपास सर्व पर्यटक हे सूर्यास्त बघण्यासाठी ह्याच ठिकाणी जमतात.   




  हेमकूट पर्वतावरील सूर्यास्त 
           सूर्यास्त बघून झाल्यावर वेळ आली होती ती दुसऱ्या दिवशी हंपीला निरोप द्यायची परत केव्हातरी नक्की येईन ह्या आशेने व मागील ४ निवासाची अविस्मरणीय यात्रा आठवत त्या रात्री झोपी गेलो व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागलो.
 
दिवसाचा खर्च
नाश्ता :- ४०/-
बाईक :- ५००/-
प्रसाद :- ११०/-
नारळपाणी : - ३०/-
चहा :- १०/-
जेवण :- ८०/-
----------------
एकूण :- ७७०/-
 
"दिन का साथी "
टीप : -  तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने जाण्याचा पर्याय कधीही उत्तम आहे कारण त्यामुळे वेळ हि वाचतो व पैसेही. पण काहीही झालं तरी तुंगभनद्रेची दक्षिण बाजू हि आवर्जून बघावी.

लाक्कुंदी बदामी पासुन साधारण पणे ८० किमी वर आहे. येथे येण्यासाठी बदामी - गदग - लाक्कुंदी असे यावे लागते.
येथे चालुक्य, कलाचुरी, सेऊना आणि होयसळा राजवटीतील ८ व्या ते १२ व्या शतकातील मंदीरे आहेत.
ह्या परिसरात सुस्थितील व भग्न अवशेषातील अशी बरीचशी मंदीरे आहेत. बरीचशी मंदीरे गावात असल्याने गावकरी ईथे गप्पा मारतात, वामकुक्षी काढतात, गुरे-ढोरे बांधतात त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे.
काही सुस्थितील व ठळक मंदीरांचे फोटोज् ईथे देण्याचा माझा प्रयत्न आहे.

 

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी!

 एखादं ठिकाण पाहून झालं की त्याच जागी पुन्हा जायला मी नाखूश असतो; मला तो पैशांचा नि वेळेचा अपव्यय वाटतो. पण काही जागा याला अपवाद आहेत. ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, ओर्छा, मांडू, हंपी इ. काही. ह्या जागा पाहून झाल्या असल्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा त्यांना भेट द्यायचा मानस आहे. ह्या यादीतल्या हंपीला भेट द्यायचा विचार बरेच दिवस मनात होता; शेवटी ह्या ऑगस्ट महिन्यात तो योग आला.

मी पहिल्यांदा हंपीला गेलो ते २०११ साली. अर्थात् ती आमची धावती म्हणता येईल अशी भेट होती. आम्ही हंपी उरकली ती दोन दिवसांत आणि तीही काय पहायचे, कसे पहायचे याचे काहीही पूर्वनियोजन न करता. यावेळी मात्र काय नि कसे पहायचे याचे नियोजन करून गेलो होतो. तरीही काही ठिकाणं पहायची राहिलीच. पण काही हरकत नाही, ह्या कारणामुळे पुन्हा एकदा हंपीला जाणे होईल, नाही का?

हंपीबाबत मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले गेले आहे - किंबहुना मराठी प्रवासवर्णानांमध्ये हंपीचा क्रमांक पहिला असेल. त्यामुळे या लेखमालेत मी फार काही लिहित बसणार नाही; फोटो जास्त नि मजकूर कमी असे ह्या लेखमालेचे स्वरूप असणार आहे. मात्र काही माहिती हवी असेल तर वाचकांनी जरूर विचारावी, मी ती देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

०६ ऑगस्ट

हंपीला जायचे ‘पुणे - सातारा - कोल्हापूर - धारवाड - गदग - हंपी’ आणि ‘पुणे - सोलापूर - वियजपूर (बीजापूर) - हंपी’ असे दोन मार्ग आहेत. पहिल्या मार्गात असलेला घाट, त्या रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि एकूणच त्या रस्त्याची खराब स्थिती पाहता आम्ही दुसरा मार्ग निवडला. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी सकाळी हंपीला पोहोचायचे आमचे नियोजन होते. असं केल्यामुळे शनिवारचा एक जास्तीचा दिवस आम्हाला स्थलदर्शनासाठी मिळणार होता. साडेनऊचे नियोजन असले तरी आम्हाला निघायला सव्वा दहा झाले. उरळीकांचनपर्यंत गाड्यांची ब-यापैकी गर्दी असली तरी पुढचा रस्ता मात्र मोकळा होता. पुणे सोलापूर रस्ता उत्तम स्थितीत आहे. मी म्हणेन की पुण्यातून बाहेर पडणा-या सगळया रस्त्यांत हा उत्तम रस्ता आहे.

रात्री एक वाजता सोलापूरच्या अलीकडे कुठेतरी आम्ही चहा घेतला.



आजकाल कुठेही बाहेर जायचे म्हटले की आधी RT-PCR चाचणी करून घ्यावी लागते. त्यात आम्ही महाराष्ट्रातले (करोनासाठी कुप्रसिद्ध राज्यातले) - तेव्हा सगळ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी करूनच निघालो होतो. एवढ्या रात्री कुणी चाचणीचे रिपोर्ट पाहणार नाही असा आमचा होरा, पण कर्नाटकात शिरताच रस्त्याशेजारीच बनवलेल्या एका तपासणी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी आमची गाडी कडेला घ्यायला लावली. ‘कुठे चाललात? हंपीला? कर्नाटकात सध्या वीकेंड लॉकडाऊन आहे, सोलापूरला परत जा आणि सोमवारी या.’ हवालदार साहेबांनी असं म्हणताच आमच्या तोंडचे पाणी पळाले. पण आम्ही चाचणी रिपोर्ट दाखवताच हवालदार साहेब जरा मवाळ झाले. त्यांनी आमची नावे तिथल्या वहीत लिहून घेतली - पण त्यानंतर ते काहीच बोलेनात - जा असेही म्हणेनात आणि थांबा असेही म्हणेनात. तेव्हा आता आपल्याला पुढे जायची परवानगी मिळाली आहे असा समज आम्ही करून घेतला आणि तिथून दबक्या पावलांनी सटकलो.

विजयपूर होस्पेट रस्त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर म्हणता येईल ‘झकास!’. चारपदरी सरळसोट रस्ता, मध्ये विस्तीर्ण दुभाजक, अगदी तुरळक गर्दी या कारणांमुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याची मजा १००% अनुभवता येते. त्यात रात्रीची वेळ, तेव्हा गर्दी आणखीनच कमी होती. विजापूर पार केल्यावर आम्ही एका पेट्रोलपंपावर गाडी कडेला घेतली. जवळपास एक तास आम्ही त्या पेट्रोलपंपावर असू - पण झोप येत नव्हती आणि गाडीत झोपायला जागाही नव्हती - तेव्हा हॉटेलवरच जाऊन झोपू असं ठरवून आम्ही निघालो. वाटेत एका टपरीवर चहा घेऊन आम्ही हंपीला पोहोचलो तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते.

०७ ऑगस्ट

केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीतल्या खोल्या ताब्यात घेतल्यावर आम्ही पहिल्यांदा आंघोळी केल्या आणि मस्त ताणून दिली. रात्री दहा वाजल्यापासून आम्ही जागे होतो, तेव्हा अगदी मेल्यासारखे झोपलो. दुपारी एक/दीडला उठून जेवणे केले आणि आमचे हंपीतले पहिले स्थलदर्शन करायला बाहेर पडलो.

आमचा पहिला थांबा होता ‘पट्टभीराम मंदिर’. हंपीतले हे सगळ्यात मोठे (विजयविठ्ठल मंदिराहूनही मोठे) मंदिर आहे. अनेक लोक याच्याशी सहमत होणार नाहीत, पण माझ्या मते हे हंपीतले सगळ्यात देखणे मंदीरही आहे. आडबाजूला असल्याने ह्या मंदिरात फारशी गर्दी नसते. किंबहुना आम्ही गेलो तेव्हा एकूणच हंपीमध्ये फारशी गर्दी नव्हती.


आम्ही हॉटेलातून निघालो तेव्हा पाऊस पडत होता. आम्ही मंदिरात शिरताच तो थांबला. हवेत आलेला गारवा, ढगाळ आकाश आणि समोर हे सुंदर, देखणे, निर्मनुष्य मंदीर. हंपीतली आमची सुरूवात तर उत्तम झाली होती!






मंदिराच्या गर्भगृहाभोवती एक संपूर्ण अंधारा प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गातून प्रदक्षिणा मारणे हा एक थरारक, रोमांचकारी अनुभव असतो. अगदी न विसरता घ्यावा असा.

मंदिर पाहून आम्ही जवळच असलेली पुष्कर्णी आणि गुंबज द्वार पहायला गेलो. हंपीत अनेक पुष्कर्ण्या आहेत, ही त्यातलीच एक.


पुष्कर्णी पाहून आम्ही निघालो गुंबज द्वाराकडे. गुंबज म्हणजे घुमट (आठवा विजयपुरचा तो गोल गुंबज). अशी अनेक द्वारे आपल्याला हंपीत दिसतात. पुर्वी संपूर्ण हंपी शहराला मजबूत तटबंदी होती आणि ही द्वारे हाच शहरात शिरण्याचा एकमेव मार्ग होता. पण फक्त शहरात शिरायचा दरवाजा एवढाच यांना अर्थ नव्हता. त्यांचा एकूणच ऐसपैस पसारा पहाता, आत शिरत असलेल्या मालाची तपासणी करणे, त्यावर कर वसूल करणे या कामांसाठी आणि आलेल्या उतारूंना क्षणभर विश्रांती घ्यायला एक जागा म्हणूनही त्यांचा उपयोग होत असावा.





गुंबज द्वार पाहून आम्ही निघालो आणखी एका द्वाराकडे - भीमद्वाराकडे. हे दार गुंबजद्वारापेक्षाही जास्त ऐसपैस आहे. एका मोठ्या दगडावर कोरलेल्या भीमाच्या आकृतीमुळे ह्या द्वाराला त्याचे नाव मिळाले आहे.








भीमद्वार पाहून होईतो साडेसहा वाजले होते. अजून बराचसा प्रकाश होता, तेव्हा एखादे ठिकाण पदरात पाडावे असे ठरले. भीमद्वाराशेजारीच गणिगत्ती जैन मंदिर आहे, पण ते आत्ता बंद झाले होते. आम्ही नकाशात थोडा शोध घेतला आणि फार लांब नसलेले तलारीगट्टा द्वार पहायला निघालो.

द्वार म्हटल्यावर आपल्यापुढे जे चित्र येते अगदी तसेच तलारीगट्टा द्वार आहे. गावांत शिरताना आजकाल कमानी दिसतात तसे. या दारातून आजही वाहतूक चालू आहे. (विजय विठ्ठल मंदीर पाहण्यासाठी याच दारातून जावे लागते.) छतावर जाण्यासाठी द्वाराच्या दोन्ही बाजूला पाय-या आहेत. आजूबाजूचा परिसर मोठा रमणीय आहे. छोटयामोठ्या टेकड्या, त्यांवर आडवेतिडवे पडलेले वेगवेगळ्या आकारांचे दगड, दूरवर पसरलेल्या केळीच्या बागा. काहीही न करता नुसते शांतपणे पहात रहावे असे दृश्य.




तलारीगट्टा द्वार परिसरात अर्धा एक तास घालवून आम्ही परत निघालो. चला, हंपीतला पहिला दिवस तर अगदी छान गेला! उद्या? हंपीतली काही प्रसिद्ध मंदिरे!

 

०८ ऑगस्ट

आजचा आमचा पहिला थांबा होता गणिगत्ती जैन मंदिर. अगदी साध्याश्या या मंदिराकडे लोकांना आकर्षित करेल असं काहीच नाही; ना भव्य आकार, ना कुठली आकर्षक कलाकुसर. मला मात्र हे मंदिर त्या काळच्या राजांच्या उदार आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक वाटलं!



गणिगत्ती जैन मंदिर पाहून आम्ही निघालो हजाररामा मंदिराकडे. आता आम्ही हंपीच्या गाभ्यात प्रवेश करत होतो. विष्णुच्या रामावताराला वाहिलेल्या हजाररामा मंदिराचं नाव पडलं आहे त्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या रामायणातल्या अनेक प्रसंगांमुळं.
















या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुख्यमंडपात उभे खांब बनवण्यासाठी वापरलेला काळा दगड. हा दगड फक्त याच मंदिरात दिसतो. हंपी परिसरात कुठेच हा दगड आढळत नाही, अर्थात फक्त या मंदिरासाठी तो कुठूनतरी आणला असावा.


हजाररामा मंदिराच्या शेजारीच आहे राजवाडा परिसर. राजा आणि इतर अतिमहत्वाचे लोक जिथे बसत आणि विजयनगर साम्राज्याचे कामकाज चालवत ती जागा. लहान मोठ्या अशा जवळपास ४० वास्तू या परिसरात आहेत. अर्थात् आज या वास्तुंचे चौथरेच ते काय उरले आहेत. चौथ-यांच्या वरचे मुख्य बांधकाम लाकडे वापरून केले गेले असेल म्हणून की काय?


हजाररामा मंदिराकडून वास्तुंचे अवशेष पहात महानवमी डिब्ब्याकडे निघालो की उजव्या बाजुला दिसते पुष्कर्णी. ही (बहुधा) हंपीतली सगळ्यात खोल आणि (नक्कीच) सगळ्यात देखणी पुष्कर्णी आहे. पुष्कर्णी आज जरी सुंदर दिसत असली तरी पन्नासेक वर्षांपुर्वी तिची अवस्था एका उथळ खड्ड्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड अशी होती. (संदर्भ: भारतीय पुरातत्व विभागाचे हंपी संग्रहालय). पुष्कर्णी शेजारीच असलेल्या आणि तिच्यात पाणी खेळवण्यासाठी उभ्या केलेल्या दगडी नळांची रचनाही आवर्जून पहाण्यासारखी आहे.



पुष्कर्णीशेजारीच आहे महानवमी डिब्बा. विजयनगर साम्राज्यातलं सगळ्यात महत्वाचं सभागृह. हंपीचे राजे इथेच महानवमी (विजयादशमी) साजरी करीत आणि राज्याचे इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही इथेच होत. जवळपास ८ मीटर उंच या चौथ-यावर चढून गेलं की वरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. अर्थात हे सभागृह एवढं उंच बांधायचं कारण काही कळत नाही, इथे चालणारे कार्यक्रम प्रजेलाही अगदी सहज दिसावेत म्हणून?




घड्याळात साडेबारा होत होते आणि ऊन अक्षरश: भाजून काढत होतं. खरं तर खोलीवर जाऊन AC लावून मस्त ताणून द्यावी असं वाटत होतं, पण कसंतरी स्वत:ला आवरलं आणि जवळच असलेलं राण्यांचे स्नानगृह पहायला निघालो. राण्यांचे स्नानगृह म्हणजे एक भला मोठा हौद आणि त्याच्या चारही बाजुंना असलेले रुंद व्हरांडे.



आत्तासारखं कडक, बोचरं ऊन पडलेलं असावं आणि जोरात पळत येऊन आपण ह्या हौदातल्या गार गार पाण्यात उडी मारावी - ऑगस्टमधल्या एका दमट, अस्वस्थ करणा-या दुपारी यापेक्षा आनंददायी गोष्ट काय असू शकते?

राण्यांचे स्नानगृह पाहून आल्यावर आम्ही एक छोटी विश्रांती घ्यायची ठरवली. ह्या भयंकर उन्हात उघड्यावर फिरण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही निघालो हंपी वस्तुसंग्रहालयाकडे. वस्तुसंग्रहालयाला जुजबी प्रवेशशुल्क आहे. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एकच तिकीट काढून तुम्ही लोटस महाल आणि गजशाळा, आणि विठ्ठल मंदीर ही ठिकाणंही पाहू शकता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं चालवलेल्या ह्या वस्तुसंग्रहालयात हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. मूर्त्या, नाणी, हत्यारं अर्थातच इथं आहेत, पण इथल्या दोन गोष्टी मला विशेष आवडल्या. पहिली म्हणजे अंदाजे २० फूट बाय २० फूट ह्या आकारात बनवलेलं हंपीचं प्रारूप (मॉडेल). हंपीतली मंदिरं, तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूच्या टेकड्या हे सगळं काही ह्या प्रारूपात आहे. हंपी नेमकं कसं आहे हे ह्या प्रारूपामुळे एका दृष्टिक्षेपात आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे हंपीला भेट दिलेल्या अंतर्राष्ट्रीय प्रवाशांनी केलेली हंपीची वर्णनं. ह्या वर्णनांमधून हंपीच्या राजांचं, त्यांच्या दिनचर्येचं, तिथल्या राज्यकारभाराचं आणि तिथं राहणा-या लोकांच्या जीवनशैलीचं दर्शन आपल्याला घडतं.





वस्तुसंग्रहालय पाहून आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यावर आम्ही तिथंच थोडी विश्रांती घेतली आणि उन्हं थोडी उतरल्यावर निघालो लोटस महालाकडे.

खरं सांगायचं तर, का कोण जाणे, लोटस महाल हंपीतला वाटतच नाही. मला तर हा महाल दुसरीकडून कुठूनतरी उचलून हंपीत अलगद ठेवल्यासारखा वाटतो. याचं कारण सोपं आहे - हंपीतल्या सगळ्या वास्तू आहेत हिंदू, लोटस महालात मात्र हिंदू वास्तुकलेचं एकही लक्षण दिसत नाही. ही वास्तू १००% इस्लामी वाटते. अर्थात्, महाल सुंदर आहे याबाबत काहीच वाद नाही.


लोटस महालाला तटबंदी म्हणून बांधलेल्या एका मोठ्या दगडी भिंतीतलं एक छोटंसं दार पार करून आपण गजशाळेजवळ पोचतो. लोटस महालाप्रमाणेच ह्या वास्तुवरचा इस्लामी वास्तुकलेचा प्रभावही अगदी सहज दिसून येतो.


गजशाळेशेजारीच आणखी एक वास्तू आहे. रुंद व्हरांडे असलेल्या ह्या वास्तुचं मूळ प्रयोजन काही कळत नाही. (माहूत/सैनिकांना राहण्यासाठी?) आज मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं इथे हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या विविध मूर्त्या ठेवल्या आहेत.


ह्या इमारतीत ठेवलेली एक गणेशमुर्ती


गजशाळेसमोरची हिरवळ फारच आकर्षक दिसत असली आणि तिच्यावर ताणून द्यायचा अनावर मोह होत असला तरी आम्ही तिथून निघालो. खरं तर विजयविठ्ठल मंदीर आमच्या आजच्या कार्यक्रमात नव्हते. पण वस्तुसंग्रहालयात घेतलेले तिकीट आज जर वापरले नसते तर ते उद्या पुन्हा काढावे लागले असते (गरीबी खूप वाईट...), तस्मात् आम्ही विठ्ठल मंदिराकडे निघालो.

विठ्ठल मंदीराजवळ गाड्या नेता येत नाहीत. तुमच्या गाड्या वाहनतळावर लावून पुढे विजेवर चालणा-या गाड्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जावे लागते. विठ्ठल मंदीराला हंपीतील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदीर म्हणता येईल - अर्थात् गर्दी बरीच होती- गाड्यांसाठी आणि मंदिरातही.


या मंदीराचे मुख्य आकर्षण आहे या मंदिरातला रथ. या रथाला आता ५० रुपयांच्या नोटेवरही स्थान मिळालेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Indian_50-rupee_note#/media/File:India_new...).



 

  त्या रथावर आधी लहानसे शिखर देखील होते जे आजही बाजूला पडलेले दिसते. अलेक्झांडर ग्रीनलॉच्या छायाचित्रात रथावरील शिखर स्पष्टपणे दिसून येते.

हे बघा ते छायाचित्र, १८५६ मधले विठ्ठल मंदिर

a

 



पूर्वी रथाला हात लावता येत असे, आत्ता मात्र रथाभोवती एक अनाकर्षक अशी साखळी ओढून घेतलेली दिसते - हा नक्कीच ‘इन्फ्लुएन्सर्सचा’ दुष्परिणाम असावा.

विठ्ठल मंदीरातल्या बहुबेक मंडपांची आता पडझड झाली आहे, तेव्हा आम्ही रथाजवळच रेंगाळलो. गर्दीमुळे अस्वस्थ व्हायला होत होतं - छायाचित्रे घेताना मला लोकांची अडचण होत होती किंवा माझी त्यांना. आता वाटतं, सुट्टीच्या दिवशी ह्या मंदिराला भेट देऊन आम्ही मोठीच चूक केली होती; वाचकांनी ही चूक करू नये. अर्धा एक तास घालवून आम्ही शेजारच्या एका मंदिराकडे निघालो. ह्या मंदिरात पाहण्यासारखे काहीच नाही. बाहेर दगडांवर आम्हाला एक दोन सरडे दिसले तेवढेच. आम्ही आधी ह्याच मंदिराला उत्किर्णित विष्णू मंदीर समजत होतो, पण खरं तर ते होते शिवमंदिर. उत्किर्णित विष्णू मंदीर विठ्ठल मंदीराच्या मागे आहे.

विठ्ठल मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो - हंपीतल्या एका नितांतसुंदर दिवसाची सांगता झाली होती!

 ०९ ऑगस्ट

आज सकाळी लवकर मातंग टेकडीवर पोहोचून तिथून सुर्योदय पहायचे आमचे नियोजन होते. पण असे होणार नव्हते (हे प्रवासवर्णन नसून नाटक असते तर ‘नियतीला हे मंजूर नव्हते’ असे लिहिले असते, असो.) स्वत: रमतगमत आवरत आणि दुस-याला ‘अरे आवर पटकन...’ असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी साडेसातला आम्ही मातंग टेकडीवर पोचलो.

मातंग टेकडी उंचीला आपल्या पर्वतीच्या साधारण दीडपट असावी. पायथ्यापासून साधारण वीस ते तीस मिनिटांत आपण वरती पोचतो.

मातंग टेकडीवरून संपूर्ण हंपी गावाचे विहंगम दृष्य दिसते.






अंजनेय पर्वत - वेळ कमी पडला आणि इथे जायचे राहिलेच.


चारही बाजुंना अस्ताव्यस्त पसरलेले मोठमोठे दगड, दूरवर वाहणारी तुंगभद्रा नदी, त्याशेजारी दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे भलेमोठे गोपूर, आडवेतिडवे पडलेले रस्ते, त्यांच्या आजूबाजूला दिसणारी (काही ओळखीची आणि बरीचशी अनोळखी) मंदिरं. सारंच सुंदर असं. मला तर मातंग टेकडी जाम आवडली, हंपीतल्या लोकांचा हेवाही वाटला. आपण हंपीत राहत असतो तर १००% रोज आलो असतो इथं.



विरूपाक्ष मंदिर




अच्युतराया मंदिर



अच्युतराया मंदिर जवळून


उन चढायला लागल्यावर आम्ही निघालो.
मातंग टेकडीवरून खाली उतरताना





मातंग टेकडी उतरेपर्यंत पावणेनऊ झाले होते. आम्ही हॉटेलात जाऊन नाश्ता केला आणि लगेच पुन्हा बाहेर पडलो. आता आम्ही हंपीतली काही फारशी प्रसिद्ध नसलेली मंदिरं पाहणार होतो.

आमचा पहिला थांबा होता चंद्रशेखर मंदिर.


नंतर आम्ही गेलो सरस्वती मंदिरात.


नंतर आम्ही गेलो अष्टकोनी स्नानगृह पहायला.




राण्यांचे स्नानगृह बंदिस्त आहे तर हे खुले - अर्थात् ते राजांसाठी असावे आणि हे सामान्य माणसांसाठी!

ही मंदिरं पाहून झाल्यावर आम्ही गेलो प्रसन्न विरूपाक्ष अर्थात् भूमिगत शिवमंदिर पहायला.





प्रसन्न विरूपाक्ष मंदिरात पाणी भरलेले आहे. ह्या पाण्यामुळे हे मंदिर थोडेसे गूढ, एखादे रहस्य आपल्या गर्भात लपवून ठेवल्यासारखे वाटते. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. पाणी दोनेक फूट खोल होते आणि पुढे आणखी खोल वाटत होते, त्यात गर्भगृहातून दोन तीन वटवाघुळे पंख फडफडवत बाहेर आली - आम्ही तत्काळ परत फिरलो!


इथे काल आम्हाला राजवाडा परिसर दाखवायला आलेला आमचा गाईड पुन्हा भेटला. खरंतर हा माणूस भापुसचा कर्मचारी होता, काल सुट्टी म्हणून गाईडचं काम करत होता. ह्या बोलघेवड्या माणसाशी जवळपास एक तास गप्पा मारल्यावर आणि मंदिराच्या आवारात असलेल्या हिरवळीवर यथेच्छ लोळल्यावर आम्ही निघालो जेवण करायला. वाटेत आम्हाला लागले शंकरनारायण द्वार. आपल्याला कोणीच पहायला येत नाही म्हणून ते बिचारे थोडेसे खट्टू झालेले दिसले.



जेवण झाल्यावर खोलीवर गेलो असतो तर बाहेर पडणे अवघड होते, तेव्हा तिथेच थोडा वेळ घालवून आम्ही निघालो माल्यवंत रघुनाथ मंदिर पहायला.

हंपीतल्या ज्या थोडक्या मंदिरांमध्ये आजही पूजाअर्चा चालू आहे त्या मंदिरांत माल्यवंत रघुनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. मंदिराची रचना गमतीदार आहे - मंदिर बांधताना जागेवर सापडलेल्या एका दगडाला न हालवता चक्क मंदिराचा एक भाग बनवले गेले आहे. त्यामुळे आज मंदिराचा कळस ह्या मोठ्या दगडावर उभा केलेला दिसतो.




सूर्यास्त होत होता. मंदिराच्या अलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे - इथे आम्ही काही वेळ रेंगाळलो.





एका मोठ्या दगडावर बनवलेले मंदिर


दूरवर दिसणारी मातंग टेकडी



माल्यवंत रघुनाथ मंदिराचा कळस



नंतर मंदिराच्या पलीकडल्या बाजूस असलेल्या दगडांवर गेलो.




मुख्य मंदिराच्या पलीकडे एक नैसर्गिक घळ आहे. याच्या दोन्ही बाजूला अनेक नंदी आणि शिवलिंगे कोरलेली आहेत.


अंधार बराच झाल्यावर (आणि सुरक्षारक्षकाने हाकलल्यावर) आम्ही तिथून निघालो.

ज्याचा शेवट गोड ते सारे गोड असे म्हणतात, पण आज आमच्या दिवसाची सुरूवात नि शेवट दोन्ही गोड झाले होते.

 

डोन्ट वरी, बी हंपी..!!

नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकुटुंब हंपी दर्शन झाले. ६ दिवसांची सहल होती. त्यातील ३ दिवस हम्पीसाठी होते (हंपी साठी तीनच दिवस दिले याचा खूप पश्चाताप होत आहे). उर्वरित ३ दिवस बदामी, पट्टदक्कल, ऐहोळे, कुडल संगम असा प्रवास केला.
रामायणातील काही प्रसंग इथे घडले आहेत. प्रभू रामचंद्रांचा सहवास या क्षेत्रास लाभला असला तरी, हंपी ओळखली जाते ती सम्राट कृष्णदेवरायामुळे. मौर्य, चालुक्य, होयसळ, काकतीय, संगम इ. अनेक राजघराण्यांनी इथे राज्य केले, पण देवरायाच्या कालखंडात या शहराने जे वैभव अनुभवलं असेल ते खचितच इतर कोणताही राजा करू शकला नसता.

विजय नगर जिल्ह्यामध्ये असलेले हम्पी हे होस्पेट पासून १५ किमी लांब आहे. हम्पी मध्ये राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स आहेत, परंतु के. एस. टी. डी. सी. चे हॉटेल्स उत्तम पर्याय आहेत. खुद्द हंपी मध्ये देखील के. एस. टी. डी. सी चे हॉटेल आहे परंतु आम्हाला तेथील बुकींग मिळाले नसल्यामुळे होस्पेटमधील ‘मयुरा विजयानगरा’ या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. हॉटेलच्या रूम्स प्रशस्त, हवेशीर आणि आरामदायी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक रूमच्या दर्शनीय भिंतीवर हम्पी मधील ऐतिहासिक स्मारकांचे वॉलपेपर त्या रूमची शोभा वाढवतात.

हॉटेलमधील खोली
हॉटेलमधील खोली

या हॉटेलपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर तुंगभद्रा धरण आहे. हॉटेलचे चेक-इन दुपारी एक वाजता होते. आम्ही साधारण १२:३० वाजता हॉटेल मध्ये पोचलो होतो. सुदैवाने रूम्स रिकाम्या असल्यामुळे आम्हाला वापरता आल्या, व फ्रेश होऊन हंपीकडे जाण्यास निघालो. जाताना सुरुवातीला कमलापूर लागते. कमलापूर मधील हॉटेलमध्ये कर्नाटकी राईस प्लेट खाल्ली. चव ठीकठाक होती. भूक लागल्यामुळे चवीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. जेवण आटोपून हंपी दर्शनाला निघालो, त्यावेळेस साधारण तीन वाजले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जेवढे बघणे शक्य आहे, तेवढे बघायचे असे ठरवले.
गळ्यामध्ये सरकारी ओळख पत्र असलेले भरपूर गाईड हम्पी मध्ये आहेत. त्यातीलच एक गाईड आम्ही निवडला. सुदैवानं आमचा गाईड मराठी भाषा चांगल्या पद्धतीने बोलू आणि समजू शकत होता.
हंपीला जाताना आपले स्वागत होते ते प्रचंड शिलांपासून पासून बनलेल्या टेकड्यांनी! या शिळा लगोरी प्रमाणे एकावर एक अशा रचलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला या प्रकारच्या आवाढव्य लगोऱ्या पाहून एकदा तरी मनात असा विचार येतो की, यातील एक जरी शिळा हलली तर काय होईल!! पण हा विचार फार काळ टिकत नाही. कारण भव्य प्रस्तरांनी बनलेली हेमकूट टेकडी आपले लक्ष वेधून घेते. एका पौराणिक कथेनुसार कुबेराने या क्षेत्रावर सुवर्ण नाण्यांचा वर्षाव केला होता, म्हणून या टेकडीला हेमकूट असे म्हणतात.

हेमकूट टेकडी
हेमकूट टेकडी

या हेमकूट टेकडीवर कडलेकालू गणेशाचे मंदिर आहे. भरपूर शिल्पांकित खांब असलेला सभामंडप व गणेश मूर्ती असलेले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपातील खांबांवर विविध वाद्य वाजवणाऱ्या परदेशी कलाकारांची शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अखंड पाषाणात कोरलेली, एका दृष्टीक्षेपात न मावणारी भव्य अशी गणेश मूर्ती आहे. या मूर्तीची उंची जवळपास ४.५ मीटर इतकी आहे. हंपी वर एकेकाळी संगम घराण्याची देखील सत्ता होती. हे संगम घराणे विरुपाक्ष शिवाचे निस्सीम भक्त होते. विरूपाक्ष मंदिराकडे जाण्याचा प्राचीन मार्ग हेमकूट टेकडीवरील कडलेकालू गणेश मंदिरावरूनच जातो. संगम राजे कोणत्याही मोहीमेपूर्वी विरुपाक्षाचा आशीर्वाद घेत असत. राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह याच मार्गाने येत असे. प्रथम श्री कडलेकालू गणेशास अभिषेक करून, हेमकूट उतरून विरुपाक्ष शिवाचे दर्शन घेत असे.
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब

खांबांवरील काही शिल्पे
खांबांवरील काही शिल्पे

वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार
वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार

.

एक वेगळीच मुद्रा
एक वेगळीच मुद्रा

मल्लयुद्ध करणारे युवक
मल्लयुद्ध करणारे युवक

बहामनी सुलतानाच्या आक्रमणाच्या खुणा हम्पी मध्ये सर्वच ठिकाणी दिसतात. या महाकाय अशा गणेश मूर्ती मध्ये सोने, हिरे अशी संपत्ती लपवली असेल असे वाटून, गणेशाच्या उदराला छेद देण्यात आला आणि त्याचा एक तुकडा वेगळा करण्यात आला. पण हा तर एक भरीव पाषाण आहे असे लक्षात आल्यानंतर चिडलेल्या सुलतानाने तेथील शिल्पांकित थांब उध्वस्त केले. पुरातत्व खात्याने दुसरा पाषाण लावून गणेशाचे छेडलेले उदर जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु खूप प्रयत्न करूनही मूळ मूर्तीचे texture त्या पाषाणाला देता आले नसल्यामुळे तो पाषाण तिथे अजूनही पडून आहे.

श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती
श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती

उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे
उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे.

हेमकूट टेकडीवर काही ठिकाणी उखळासारखे खळगे आहेत. बहुदा त्या खांब रोवण्यासाठी केलेल्या खाचा असाव्यात. काही कारणाने ते काम अपूर्ण राहिलेले असावे. या टेकडीवरून विरुपाक्ष मंदिराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

टेकडीवरील खळगे
टेकडीवरील खळगे

हेमकुट टेकडीच्या डाव्या बाजूला ऋष्यमुक पर्वत तर उजव्या बाजूला मातंग पर्वत आहे.

हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत
हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत

हेमकुट टेकडीवरून विरुपाक्ष मंदिरात जाण्याचा प्राचीन मार्ग बंद असल्याने टेकडीला वळसा घालून मंदिराकडे जावे लागते. जातानाच्या मार्गावर अनेक लहान-सहान मंदिराचे भग्नावशेष इतस्त: विखुरलेले दिसतात. विरुपाक्ष मंदिरास जाण्यासाठी जवळपास ४०० मीटर रस्ता पायी पार करावा लागतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला हेमकूट टेकडी व उजव्या बाजूला प्राचीन बाजारपेठेचे अवशेष दिसतात. बाजारामधील दुकानांची रचना दुमजली आहे. सध्या फक्त या दुकानांचे खांबच शिल्लक आहेत. या बाजारात पूर्वी सोने, चांदी, हिरे यांचा व्यापार होत असे. विजयनगरच्या वैभवात या व्यापारीसंकुलाचा खूप मोठा हातभार होता. शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून बाजारपेठेची भव्यता जाणवते. आणि नकळतपणे सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या लखलखाटात उजळलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर आणून मन रोमांचित होते. अशा रोमांचित मनाने मंदिरात जाण्यासाठी आम्ही देवरायाने बांधलेल्या भल्यामोठ्या गोपुराकडे प्रस्थान केले.

विरुपाक्ष मंदिरासमोरील बाजार
.

विरुपाक्ष मंदिराची स्थापना ७व्या शतकात होयसळांनी केली . चालुक्य राजांनी मंदिरामध्ये भर घातली. १५व्या शतकामध्ये हंपी विजयनगराची राजधानी झाली आणि सम्राट कृष्णदेवरायाने मंदिरास गोपुरे व तटबंदी बांधून वैभवास आणले. मंदिरामध्ये एकूण ३ गोपुरे आहेत. त्यापैकी पूर्वाभिमुख असलेले गोपूर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ९ मजली शिल्पांनी खचाखच भरलेल्या या गोपुराची उंची ५० मीटर इतकी आहे.

मुख्य गोपूर
.

गोपुराच्या डाव्या बाजूला ‘कालारि शिवाचे’ शिल्प आहे. मार्कंडेय मुनींचे प्राण हरण करण्यासाठी कालपुरुष आला असता, त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी शंकराने कालपुरुषाशी युद्ध केले व त्यास हरवले अशी कथा या २ फूट लांबीच्या शिल्पामध्ये मांडली आहे. देवरायाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गोपूर शैलीस त्याच्या नावावरून ‘रायगोपुरे’ असे म्हणतात. दक्षिण भारतामध्ये हमखास अशी गोपुरे आढळतात.

कालारि शिव शिल्प
.

गोपुरातून आत गेल्यावर डाव्या बाजूस त्रिकाळदर्शनाचे प्रतिक असलेला त्रिमुख नंदी आहे. व उजव्या बाजूला एका भिंतीवर विजयनगराचे ध्वजचिन्ह आहे. या ध्वजावर चंद्र, सुर्य, वराह व उलटा खंजीर आहे. चंद्र सुर्य हे काळाचे प्रतिक आहे, वराह विष्णूचे व खंजीर विजयाचे प्रतिक आहे. ‘ विष्णूच्या कृपेने आचंद्र्सुर्य आम्ही विजय मिळवत राहू’ असा या ध्वजाचा अर्थ.

ध्वजचिन्ह
.

.

ध्वजा शेजारीच कृष्णदेव रायाचा जुन्या कन्नड लिपीतील शिलालेख आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूनी भरपूर ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामध्ये सतत धार्मिक कार्य चालू असते.अग्नेयेकडे मुद्पाकखाना आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ व बलीस्तंभ आहे. नंदिमंडप , सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहामध्ये प्रसन्न विरुपाक्ष विराजमान आहेत. या शिवलिंगाची दैनंदिन पूजा होत असते. दीपावली दरम्यान तिकडे नुकताच दीपोत्सवही साजरा झाला होता.
.

दीपस्तंभ व बलीस्तंभ
.

रंगमंडपामध्ये रंगीत भित्तीचित्रे आहे. यामध्ये शिव पार्वती विवाह, राजाचे युद्ध, अर्जुनाचा मत्स्यभेद अशी चित्रे चितारली आहेत. या चित्रांनी अशी काही मोहिनी घातली होती कि त्यांचे फोटो घेण्याचे भान सुद्धा राहिले नाही.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिव पूजनाचा महिमा कोरला आहे. यामध्ये सर्व योनीतील सजीव शंकराची उपासना करत आहेत असे दाखवले आहे. या शिल्पामध्ये कन्नाप्पा नयनार चे देखील शिल्प आहे. कन्नप्पा नयनार हा निस्सीम शिवभक्त होता. तो रोज सरोवरातून ताजी कमलफुले शंकरास अर्पण करत असे. एकदा त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने त्याला कमल फुलांच्या ऐवजी नेत्रकमळ वाहण्यास सांगितले. कन्नप्पाने किंचितही विचार न करता कट्यारीने एक डोळा काढला व शिवलिंगास लावला. दुसरा डोळा काढल्यानंतर अंध झाल्याने तो योग्य ठिकाणी लावता येणार नाही असे पाहून त्याने खुणेसाठी आपला एक पाय शिवलिंगावर ठेवला. आणि दुसरा डोळा काढणार इतक्यात शंकर प्रकट झाले व त्यांनी प्रसन्न होऊन कान्नप्पास डोळे देऊन आशीर्वाद दिला.

.

या भित्तीशिल्पाच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला दक्षिणेकडे काही परिवार देवतांची मंदिरे आहेत व एक पुष्करणी तलाव आहे. याच बाजूला ७ ते ८ पायर्यांचा एक दगडी जीना आहे. हा जीना वर चढून गेल्यावर एक अंधारी खोली आहे. या खोलीच्या एका भिंतीवर फुटभर लांबीचा एक झरोका आहे आणि त्यासमोरील भिंत पांढऱ्या रंगाने रंगवली आहे. या भिंतीवर झरोक्यामधून मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुराची उलटी प्रतिमा दिसते. एका फुटभर झरोक्यामधून ५० मीटर उंच गोपुराची संपूर्ण उलटी प्रतिमा पडण्याचे तंत्रज्ञान अचंबित करणारे आहे. (वैज्ञानिक भाषेमध्ये या तंत्रज्ञानास पिन होल कॅमेरा तंत्र म्हणतात.)

.

अशा वास्तू बांधणारे स्थपती हे मनुष्य नसतीलच असे वाटते. दैवी देणगी असल्याशिवाय असल्या कलाकृती जन्म घेत नाहीत. एवढी अफाट बुद्धिमत्ता, कौशल्ये यांचा मध्येच कुठे ऱ्हास झाला या प्रश्नाने खूप पोखरून काढले. आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगावा कि वर्तमान काळातील निष्क्रीयतेबद्दल चिंता व्यक्त करावी या प्रश्नाचा विचार करत संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो.

क्रमशः


संध्याकाळी ७:०० च्या दरम्यान हंपीमधून बाहेर पडलो. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये परततानाच वाटेतील एका छोट्या हॉटेलमध्ये उत्तप्पा खाल्ला, कारण जेवण करण्याइतपत भूक कोणालाच नव्हती. दिवसभराचा प्रवास आणि भटकंतीमुळे सगळेच खूप दमले होते. त्यामुळे रात्री थोड्याफार गप्पा मारून ९:०० वाजता सर्वजण झोपी गेलो.
पहाटे ५:३० ला मला जाग आली. झोप व्यवस्थित झाल्यामुळे फ्रेश वाटत होते. हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला. तिथेच न्याहारी करून बाहेर पडायचे असे ठरले असल्याने न्याहारी किती वाजता सुरु होते याची चौकशी करून रूमवर आले. तो पर्यंत बाकीचे उठले होते. ८ वाजेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपून सर्वजण तयार झाले. हॉटेलच्या पूरक नाश्त्यामध्ये इडली, उडीद वडा, पोहे आणि अननस शिरा असे पदार्थ होते. सर्वच पदार्थ रुचकर होते. पण मला त्यातील उडीद वडा खूप आवडला. वडा जितका कुरकुरीत होता तितकाच स्पोन्जी सुद्धा होता. वडा साम्बारावर ताव मारून पुढील हंपी दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी पाहिलं ते कृष्णमंदिर.

ओरिसाचा राजा गजपती याचे साम्राज्य आंध्र व तेलंगणातील काही भागापर्यंत होते. साम्राज्य विस्तार करण्यासाठी इ.स. १५१२ मध्ये कृष्णदेवरायाने ओरिसावर चाल करून तो भाग आपल्या साम्राज्यास जोडला. या स्वारीमध्ये त्याने तेथील बाळकृष्णाची मूर्ती आणली व तिच्यासाठी हे मंदिर बांधले. [बालकृष्णाबरोबरच तहानुसार रायाने आपली तिसरी पत्नी म्हणचेच गजपती राजाची कन्या जगन्मोहिनीशी (हिला पद्मावती सुद्धा म्हणतात) विवाह करून तिला विजयनगरात आणले. या उत्कल लढाईनंतर रायाने सपत्नीक तिरूमल येथे जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेतले होते. या भेटीत त्याने व्यंकटेशास हिरे, माणके तसेच त्याच्या तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी या दोन्ही पत्नींनी चांदीची ताटे आणि पेले दिले होते. त्यानंतर रायाने तिरूमल मंदिरामध्ये दोन पत्नीन्सोबत पंचधातूंच्या मुर्त्या घडवून घेतल्या, ज्या आजहि व्यंकटेश मंदिरात पाहायला मिळतात. इथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे रायाने यावेळेस नवपरिणीत वधू जगन्मोहिनीची मूर्ती का बरे घडवली नसेल? उपलब्ध साहित्यात या दर्शन भेटीमध्ये तिचा कुठेच उल्लेख नाही.]

कृष्ण्मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एक उंच दगडी चौकट आहे. या चौकटीवर एका बाजूला विष्णूचे दशावतार आणि दुसऱ्या बाजूला पोपट, मोर, सारिका इ. पक्षांची शिल्पे कोरली आहेत. हि सर्व शिल्पे एका वेलबुट्टीने बांधली आहेत. चौकटीच्या वरच्या भागावर नागपाश आहेत. बहुदा वाईट शक्तींना बाहेर रोखण्यासाठी तशी योजना असावी.

प्रवेश्द्वारावरची चौकट

प्रवेशद्वार चौकट

चौकटीवरील नाग पाश

chaukat

प्रवेशद्वारावर गोपूर आहे. या गोपुरावर कृष्ण्देवरायाच्या कलिंग स्वारीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच मुख्य मंदिर आहे. मंदिरासमोर बलीशीला आहे. (बाळकृष्णाला बळी दिल्याचे यापूर्वी कधी ऐकले नव्हते.) अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ५० खांबांवर हे दोन्ही मंडप तोलले आहेत. खांबावर गरुड, हनुमान, विष्णूचे इतर अवतार तसेच कृष्णलीला कोरल्या आहेत. या मंडपांच्या तिन्ही बाजूना बाहेरून मोठमोठाली व्यालशिल्पे आहेत.

व्यालशिल्पे

१

c

ग

गर्भगृहामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती, पण ती सध्या एका संग्रहालयामध्ये आहे. मुख्यमंदिराच्या उजव्या बाजूस एक छोटे गणेश मंदिर आहे. गणेश मूर्ती नाहीये पण मूर्तीच्या चबुतऱ्यावरील उंदीरमामा स्पष्ट दिसतात.

गणेश मंदिर

व

गणेश मुर्तीखालील चबुतरा

.

बाळकृष्ण मंदिराच्या मागे उजव्या बाजूस रुक्मिणी मंदिर देखील आहे. अग्न्येय दिशेस पाकशाला आहे व मंदिराच्या चहुबाजूनी पूजापाठ यज्ञविधी करण्यासाठी ओवऱ्या आहेत. दक्षिण भारतामध्ये कोणत्याही मंदिर परिसरात पुष्करणी तलाव असतोच. भाविकांना पूजा अथवा देवास जलाभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी उपलव्ध व्हावे म्हणून हे तलाव बांधतात. नवीन भाविकांना पुष्करणी सहज शोधता यावी म्हणून मंदिराच्या मुख्य भिंतीवर अथवा प्रवेश भिंतीवर एक मत्स्यशिल्प कोरलेले असते. या माशाचे तोंड ज्या दिशेला असते, त्या दिशेस पुष्करणी असते. कृष्ण्मंदिरासमोर देखील पुष्करणी तलाव आहे.

पुष्करणीची दिशा दाखवणारे मत्स्यशिल्प

m

पुष्करणी

p

मंदिरासमोरून एक रस्ता जातो, या रस्त्याच्या पलीकडे एक दगडी आयताकृती दानपेटी आहे. दानपेटीच्या दर्शनी बाजूवर चक्र, गंध, शंख व चंद्र, सुर्य अशी व्यंकटेशाची चिन्हे आहेत. दानपेटीला दोन दगडी झाकणे आहेत आणि पैसे टाकण्यासाठी दोन चौकोनी भगदाडे आहेत. लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करता यावे म्हणून ती दानपेटी ठेवली होती असे आम्हाला गाईडने सांगितले.

दानपेटी

द

पैसे टाकण्याची जागा

द

पुढील ठिकाण चालत जाण्या इतपत अंतरावर होते, त्यामुळे गाडी कृष्ण मंदिराशेजारीच पार्क केली आणि आम्ही चालत निघालो. जाताना एका बाजूला केळीच्या बागा होत्या आणि दुसऱ्या बाजूला भग्नावशेष विखुरलेले होते. वाटेत एके ठिकाणी चौकोनी दगडी कमान लागली. तत्कालीन करवसुलीचे ते ठिकाण होते. कमानीमधून बाहेर पडून ५ ते ७ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला हम्पी मधील मुख्य आकर्षण असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मूर्तीने लक्ष वेधून घेतले. ६.७ मी उंची असलेली ही मूर्ती एकपाषाणी आहे.

न

आर्य कृष्णभट्ट नावाच्या मुर्तीकराने इ.स. १५२८ मध्ये ही मूर्ती घडवली आहे. सप्तफणी शेषाच्या ललितासनामध्ये नरसिंहस्वामी विराजमान आहेत. डाव्या मांडीवर लक्ष्मी होती पण सध्या नाहीशी आहे. सध्या हि मूर्ती विनाछत उघड्यावरच आहे. पण पूर्वी येथे एक ६ खांबी मंदिर होते आणि मंदिराला चंदनी छत देखील होते, परंतु आक्रमकांनी ते छत जाळून टाकले व खांब आणि लक्ष्मीची मूर्ती देखील उद्ध्वस्त केली . आगीच्या ज्वालांची झळ लागून नरसिंहाच्या छातीवर काळा डाग पडला व तडे देखील गेले आहेत. मंदिरातील सहा खांबांपैकी सध्या २ च खांब शिल्लक आहेत. हि मूर्ती उठून दिसते ती नरसिंहाच्या विलाक्ष्ण उग्र डोळ्यांमुळे! खोबणीतून बाहेर आलेले चेंडूच्या आकाराचे गोल गरगरीत मोठे डोळे, विक्राळ सुळे, रुंद जबडा यामुळे मूर्ती अधिकच उग्र भासते. नरसिंह मूर्तीचे पाय देखील तोडले गेले होते आणि ते इतस्ततः विखुरले होते, पुरातत्व विभागाने ते जोडले आणि त्यांना आधार म्हणून गुढघ्यावर एक पट्टा लावला आहे असे आम्हाला गाईडने सांगितले होते. परंतु अभ्यासकांच्या मते तो पट्टा अलिकडचा नसून योगपट्ट आहे.
लक्ष्मीनृसिंह मूर्ती शेजारीच बडवी लिंग मंदिर आहे. बडवी म्हणजे गरीब. एका गरीब स्त्रीने स्वखर्चाने हे मंदिर बांधले आहे. आतमध्ये एक पाषाणी भव्य असे शिवलिंग आहे. शिवलिंग कायम पाण्यात असते. पृवी तिथे तुंगभद्रेचे पाणी येत होते, त्यासाठी चिंचोळी दगडी वाट केली होती. परंतु सध्या पाईपलाईन द्वारे पाणी सोडले जाते. शिवलिंगाच्या साळुंकीवर त्रिनेत्र कोरले आहेत. एका सध्या रेषेने हे नेत्र दाखवले आहेत, यावरून तिथे आणखी काही कोरीव काम करायचे होते, परंतु ते काही कारणास्तव राहून गेले असावे..

बडवी लिंग

ब

येथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे ज्या आक्रमकांनी नृसिंह मंदिराचे एवढी नासधूस केली त्यांनी शेजारीच असणार्या बडवी लिंगास धक्का देखील कसा लावला नाही ! याचे कारण काय असावे? शिवलिंग मानवी स्वरुपात नसल्याने तो देव नसून फक्त एक शिल्प आहे असे वाटल्याने सुरक्षित राहिले असावे कि या प्रकारास कुठे तरी शैव वैष्णव संघर्षाची किनार आहे ते त्या नरसिंहास व भोलेनाथासच ठाऊक !!
क्रमशः

 

 

हंपी:

 दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १

 

पूर्वपिठीका

वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी. दरोजी अभयारण्याची चौकशी करुन झाली. अभयारण्यात दुपारी २ ते संध्याकाळी ६ इतक्याच मर्यादित वेळेत प्रवेश असतो आणि त्याच वेळेस अस्वलं दिसतात अशी पक्की माहिती मिळाली. मग विचार केला की तिथल्या जंगललॉज मध्ये राहण्यापेक्षा खुद्द हंपीनजीक राहून एक संध्याकाळ दरोजीसाठी राखीव ठेवावी. मग त्या दृष्टीने हंपीनजीक मुक्कामाची ठिकाणे शोधणे सुरु झाले. हंपीतील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरानजीक असलेल्या हंपी बाझार येथे काही होम स्टे'ज आहेत पण तिथे कार पार्किंगची व्यवस्था नाही. हंपीला येणारे पर्यटक मुख्यतः होस्पेटला मुक्काम करुन हंपी दर्शन करतात, होस्पेट मात्र १२ किमी लांब, त्यापेक्षा मग कमलापूर जे हंपी पासून (म्हणजे हंपीच्या मुख्य विरुपाक्ष संकुलापासून) चार किमी लांब आहे तेथील मयुरा भुवनेश्वरी ह्या कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसोर्टची माहिती मिळाली. एप्रिल/मे हा हंपीचा ऑफ सीजन असल्याने (कारण अतिशय कडक उन्हाळा) खोल्याही उपलब्ध होत्याच. अर्थात खोल्या उपलब्ध असल्या तरीही आमचं जाणं काही नीट ठरत नव्हतं. मित्रांचं स्केड्युल नीट जमत नव्हतं. शेवटी शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला हंपी़ला जायचं एकदाचं नक्की झालं आणि शनिवारी म्हणजे २९ तारखेला चिंचवडहून दुपारी निघायचं ठरलं. मग लगेच कमलापूरच्या रिसोर्टला एक खोली आरक्षित केली. आणि सर्व काही जमवून शनि दुपारी ३ च्या आसपास पुणं सोडलं.

हंपीला जायचे मुख्य मार्ग दोन. पहिला पुणे-कोल्हापूर-बेळगाव-धारवाड-हुबळी-गदग-होस्पेट-हंपी असा आणि दुसरा पुणे-सोलापूर-विजापूर- बदामी-बागलकोट -होस्पेट - हंपी असा. सोलापूरमार्ग किंचित जवळचा असूनही बेळगाव मार्गे निघालो कारण हा रस्ता अतिशय वेगवान आहे. कोल्हापूरला चहा घेऊन कित्तूरपासून थोडंसं पुढे जेवणासाठी एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबा घेतला. एकदा बेळगाव सोडलं तर हुबळी वगळता जेवायची सोय होणे थोडे अवघडच आहे. धारवाडला होते पण त्यासाठी हायवे सोडून शहरात शिरावे लागते. ढाबे अगदी कमी प्रमाणात आहेत. हुबळी सोडल्यावर थेट होस्पेटपर्यंत तर ढाबे अतिशयच कमी आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन प्रवास करताना जेवायच्या सोयीसाठी बेळगाव किंवा हुबळी उत्तम. कित्तूरनजीक जेवण करुन १२/१२:३० पर्यंत हुबळीस पोहोचलो. तिथे एका ज्युस सेंटरवर मिल्कशेथ विथ आईसक्रीम खाऊन पुढच्या प्रवासास लागलो. उत्तररात्रीचा प्रवास टाळायचा असल्याने शिरगुप्पीपासून पुढे आणि गदगच्या अलीकडे हुबळीपासून चाळीस/पन्नास किमी प्रवास करुन रात्री दी़डच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर गाडी लावली आणी गाडीतच आडवे होऊन २/३ तास झोप काढली. पहाटे पावणेपासच्या सुमारास पुन्हा प्रवास सुरु केला. दिडशे किमी अंतर राहिलं होतं. गदग-लकुंडी-कोप्पल असा प्रवास करुन होस्पेटला पोहोचलो तेव्हा सात वाजले होते. गदग, लकुंडीलाही भरपूर मंदिरे आहेत, परतीच्या प्रवासातही वेळेअभावी ती पाहता आली नाहीत.

होस्पेटपासूनच हंपीचे अवशेष दिसायला सुरुवात होतेच. हंपीच्या खडकाळ टेकड्या लक्षवेधी आहेत, तुंगभद्रा धरण, नदीचं मोठमोठ्या खडकांनी युक्त असलेलं पात्र, आजूबाजूला सतत दिसणारी लहानमोठी प्राचीन मंदिरे हे बघत बघतच साडेसातच्या सुमारास कमलापूरला पोहोचलो. कमलापूरच्या अलीकडेच एका रस्त्याच्या एका बाजूला एक बंधारा आहे. बंधार्‍याच्या एका बाजूला उन्हाळ्यात पाणी आटल्याने पूर्ण दलदलीचा प्रदेश आणि दुसर्‍या बाजूला केळीच्या गच्च बागा. आजचा रस्ता ह्या बंधार्‍यावरुनच गेलेला आहे. हा बंधारा विजयनगरच्या राजांनी बांधलेला असून त्याचे पाणी हंपीत खेळवलेले आहे. असे कित्येक बंधारे येथील आसपासच्या प्रदेशात त्या महान राजवटीत बांधले गेलेले आहेत.

कमलापूरला मयुरा भुवनेश्वरीत जाऊन खोली ताब्यात घेतली आणि छानपैकी तासभर झोप काढली आणि आवरुन हंपी बघायला निघालो. हंपी बघायला कशी आणि कुठून सुरुवात करायची ह्याची कसलीही योजना न आखल्याने आणि स्थलदर्शनाचा नकाशाही जवळ नसल्याने मन मानेल तसं भटकायचं असा विचार केला आणि कमलापूर येथील हंपी गेटमधून आत शिरलो.

a

हंपी: दिवस पहिला

हंपी म्हणजे रामायणात उल्लेख असलेले पंपाक्षेत्र. तुंगभ्रद्रा नदीचे पूर्वीचे नाव पंपा, त्याचाच अपभ्रंश होऊन पंपाचे हंपी हे नाव रूढ झाले. इकडील सर्व टेकड्यांची नावेही रामायणात उल्लेख असलेलीच. उदा. मातंग, गंधमादन, अंजनेय टेकड्या. हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीच्या टेकड्यांमध्ये विजयनगर हे शहर वसवले ते हरिहर आणि बुक्कराय ह्या दोघांनी त्यांच्या गुरुंची, स्वामी विद्यारण्यांची प्रेरणा घेऊन. हे हरिहर आणि बुक्कराय होयसळ राजा बल्लाळ ह्याच्या पदरी होते. इस्लामच्या वावटळीत होयसळ राजवट संपुष्टात आल्यावर ह्या दोघांनी होयसळांचे सरदार, आप्त इत्यादिंच्या पाठिंब्याने हिंदू धर्म आणि हिंदू राजवटीच्या पुनरुत्थान करण्याच्या इर्षेने विजयनगर ही राजधानी स्थापन केली. पहिल्या हरिहराचा काळ हा राज्य स्थिरस्थावर करण्यात गेला, ह्याचानंतर गादीवर आला तो ह्याचा भाऊ बुक्कराय. ह्याच्या राजवटीत विजयनगरचा राज्यविस्तार होत जाउन राज्य समृद्ध होत गेले आणि सर्वबाजूंनी घेरुन असलेल्या मुसलमानी सत्तांवर विजयनगरची दहशत बसायला सुरुवात झाली. विजनगरच्या राजकीय इतिहासात ४ घराणी झाली. हरिहर/बुक्करायाचे संगम घराणे, साळुव नरसिंहाचे साळुव घराणे, तुळूव नरसिंहाचे (नरसा नायक) तुळूव घराणे आणि अलिय (जावई) रामरायाचे अराविडू घराणे. तुळूव घराण्यातच विजयनगरचा सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला तो म्हणजे कृष्णदेवराय. अर्थात हंपीचा इतिहास सांगणे हा ह्या लेखाचा उद्देश नाही. जयंत कुलकर्णी काकांनी हा इतिहास आपल्या अप्रतिम लेखमालेद्वारे मिपावर ह्याआधीच आणलेला आहे. मी फक्त इथले अल्पसे स्थलदर्शन ह्या लेखमालेद्वारे घडवून आणणार आहे.

आमच्याकडे नकाशा नसल्याने आम्ही मनमुराद भटकत होतो, त्यामुळेच काही वेगळी ठिकाणे पाहता आली. इतरांच्या सोयीसाठी हा मुख्य नकाशा खाली देत आहे त्यानुसार नीट योजना आखल्यास कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणे पाहता येतील.

हंपी स्थलदर्शन नकाशा www.hampi.in ह्या संस्थळावरुन साभार.
a

चंद्रशेखर मंदिर

कमलापूर गेट मधून हंपीत प्रवेश करता करताच उजव्या हाताला एक मंदिर लक्ष वेधून घेतं ते म्हणजे चंद्रशेखर मंदिर. तिकडे जाण्यासाठीडांबरी रस्ता सोडून उजवीकडे कच्च्या रस्त्यावर गाडी घेताच एकाएकी असंख्य अवशेष दिसू लागतात आणि हंपीचं विराट, ओसाड, भग्न स्वरुप सामोरे येते.
चंद्रशेखर मंदिर जरी कमलापूरला सर्वात जवळ असलं तरी हे हंपीच्या मुख्य ठिकाणांपासून लांब असल्याने बरेचसे दुर्लक्षित आहे. त्यामुळे इकडे अजिबात गर्दी नसते. हे मंदिर राजवाडा परिसरात (Royal Enclosure)गणले जाते. तरीही ते शाही ठिकाणांपासून लांबच आणि एका कोपर्‍यात असल्याने खूपच दुर्लक्षित आहे. हे मंदिर साधारण १६ व्या शतकात बांधले गेले. इकडील मुख्य मंदिरांवर गोपुरे दिसतात. सम्राट कृष्णदेवरायाने ही गोपुरे बांधवून घेतली असल्याकारणाने त्यांना रायगोपुरे असे म्हटले जाते.

चंद्रशेखर मंदिर

a
इकडील जवळपास सर्वच मंदिरांची शैली एकसारखी आहे. गोपुर, मंदिराचे आवार, वाद्यमंडप, सभामंडप, दोन्ही बाजूंस असलेले अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह.
गोपुर तसंच कळसांची बांधकामं ही मातीच्या भाजलेल्या वीटांची आहेत. विटकामामुळे त्यांची बरीच हानी झालेली दिसते.

चंद्रशेखर मंदिराचे गोपुर

a

गोपुरांवर विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात.

a

मुख्य मंदिर परिसर

a

मंदिराचा बाह्यभाग
a

सभामंडपात नक्षीदार स्तंभ असून त्यावर व्याल, बाळकृष्ण, गायी, वानरं, तसंच इतरही अनेक वेगवेगळ्या मूर्ती, नक्षी इत्यादींचे कोरीव अंकन केले गेले आहे.

सभामंडप
a

घोंगडी पांघरलेल्या गुराख्याची मूर्ती लक्षवेधी आहे.

a

एका स्तंभावर गायवासरु कोरलेले आहे. हंपीतल्या बहुतेक सर्वच मंदिरात हे शिल्प दिसते.

a

स्तंभांवरची अजून काही शिल्पे

a--a

ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर समोरच दिसते ते सरस्वती मंदिर

सरस्वती मंदिर

सरस्वती मंदिर

a

हे मंदिर एका अतिशय लहानश्या अशा टेकडीवर किंबहुना दगडाच्या ढिगार्‍यावर वसलेलं आहे. हे एक लहानसे मंदिर असून ते किंचित उंचावर असल्याने येथून राजवाडा परिसराचे कित्येक अवशेष दिसतात.

सरस्वती मंदिराच्या प्रवेशद्वारातून दिसणारे अवशेष
a

सरस्वती मंदिर

a

हे मंदिर मूळचं वैष्णव असून १५५४ सालच्या शिलालेखाप्रमाणे हे तिरुवेंगलनाथ ह्या नावाने ओळखले जात होते. कालांतराने ह्या मंदिराला सरस्वती मंदिर हे नाव पडले. मात्र मुख्य वैष्णव मंदिराची ओळख अजिबात लपत नाही. मंदिरातील स्तंभांवर कृष्ण, विष्णू, दशावतार, गोपिका वस्त्रहरण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत तसेच गाभार्‍यातही गरुड मूर्ती कोरलेले एक पीठ आहे, त्यावर विष्णू अर्थात तिरुवेंगलनाथाची उभी मूर्ती असणार हे निश्चित.

गोपिका वस्त्रहरण प्रसंग
a--a--a

मत्स्यावतार

a

गर्भगृहातील विष्णूमूर्तीचे पीठ
a

सरस्वती मंदिरातून बाहेर येताच उजव्या हातास आहे ते अष्टकोनी स्नानगृह

अष्टकोनी स्नानगृह

हे एक अष्टकोनी आकारातलं प्रचंड मोठं स्नानगृह आहे. स्तंभयुक्त मंडप, आत उतरती रचना, पाणी खेळवण्यासाठी बनवलेले दगडी चॅनेल्स. मध्यभागी एक रुंद स्तंभ (ह्यावर पूर्वी कारंजे असावे) अशी याची रचना. चंद्रशेखर मंदिरापासून एका रेषेत हे साधारण पाऊण किलोमीटर अंतरावर आहे.

अष्टकोनी स्नानगृह

a

स्नानगृह जवळून

a

अष्टकोनी स्नानगृहाचा मुख्य भाग
a

स्नानगृह परिसरातून दिसणारा हंपीचा रुक्ष, ओसाड, भग्न प्रदेश

a

ह्यानंतर आम्ही निघालो ते राजवाडा परिसर पाहायला. सरस्वती मंदिरापासूनच पुढे अर्ध्या/पाऊण किलोमीटर अंतरावर हा ठिकाण आहे. तटबंद असलेला हा राजवाडा परिसर (Royal enlcosure) हा जवळपास असंख्य विविध प्रकारच्या इमारतींचा समुच्चय, विजनगरच्या राजधानीचे केंद्र, विजयनगरचा दसरा, दिवाळी तसेच इतरही सण, उत्सव साजरे होणारा महत्वाचा परिसर, त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

 राजवाडा परिसर- भाग २

 

सरस्वती मंदिरापासून एक कच्चा रस्ता जातो तो राजवाडा परिसराकडे. तसं बघायला गेलं तर चंद्रशेखर मंदिर आणि सरस्वती मंदिर राजवाड्याच्या परिसरातच येतात पण तुलनेने ते तेथून काहीसे लांब आहेत. राजवाडा परिसर (Royal enclosure) हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं, विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली, विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील येथेच. विजयनगरचं एक सर्वांगसुंदर मंदिरही ह्याच परिसरात, आजही कर्नाटकात महत्वाचा समजला जाणारा दसरा उत्सव होई तो इथेच. विजयनगर परिसरात लांबवरुन आणलेल्या दगडी कालव्यांतील पाणी जमा होई ते इथेच. साहजिकच ह्याच परिसराची राक्षसतंगडीच्या लढाईनंतर सर्वाधिक हानी झाली. आज दिसतात त्या इमारतींचे केवळ अवशेष उरले आहेत तरीही येथील पूर्ववैभवाची कल्पना हा परिसर पाहताना नक्कीच येते. ह्या भग्न इमारतींमध्ये आजही एक इमारत तिच्या मूळच्या स्वरुपासकट उभी आहे ती म्हणजे महानवमी डिब्बा

राजवाडा परिसराचे भग्नावशेष

a

राजवाडा परिसराचा नकाशा (www.hampi.in संस्थळावरुन साभार).

a

महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल

महानवमी डिब्बा अर्थात ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्‍यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र. महानवमी डिब्बाच्या समोरील पटांगणात दसरा महोत्सवाचे कार्यक्रम होत असत आणि विजयनगरचे सम्राट ह्याच इमारतीवर उच्चासनावर बसून त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत असत.

विजयनगरच्या नवरात्र महोत्सवाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्या इमारतीचे वर्णन कसे करतो ते बघा.

...चौकाच्या उत्तरेकडील डाव्या बाजूस एक मोठी एकमजली इमारत आहे. ही इमारत हत्तीच्या आकाराच्या आणि इतर अनेक चित्रे कोरलेल्या खांबांवर उभी आहे. इमारतीचा दर्शनी भाग मोकळा असून एका दगडी जिन्याने लोक वर जातात. इमारतीच्या खाली सभोवार चिरेबंदी फरशी असून उत्सव पाहण्यासाठी आलेले काही लोक तिथे उभे राहतात. ओरियाच्या (ओरिसा) राजास जिंकून युद्धावरुन परत आल्यावर कृष्णदेवरायाने हा राजवाडा बांधला म्हणून त्यास विजयमहाल म्हणतात. चौकाच्या उजव्या बाजूस अरुंद पण लाकडी मचाणे बांधलेली होत. ती भिंतीच्या तटावर जात इतकी उंच होती. त्यांच्या वरच्या बाजूस लाल हिरवी मखमल लावलेली असून सर्वत्र खाली-वर सुंदर कापडाने ही मचाणे सजवलेली होती...ही लाकडी मचाणे एकूण अकरा असून फक्त उत्सवासाठीच ती उभारण्यात येतात, एरवी नाही. दरवाजासमोरील दोन वर्तुळाकार आकारात सोन्यामोत्याचे व जवाहिराचे अलंकार घातलेल्या नर्तिका होत्या...इमारतींवर जाण्याला दोन सुरेख घोटीव दगडाचे जिने आहेत. पैकी एक मध्यभागी असून, दुसरा टोकाला आहे. ह्या इमारतीचे सर्व खांब, भिंती आणि छत भारी कापडाने मढवलेले आहे. भिंतीवरील कापडावर वेलबुटीचे नक्षीकाम केलेले आहे. या इमार्तींना एकावर एक असे दोन चबुतरे आहेत. चबुतर्‍यांवर शिल्पकाम सुंदर असून त्यांच्या बाजूवर कोरीव काम आहे. ह्या चबुतर्‍यांवर राजाच्या मर्जीतील लोकांची मुले आणि त्यांच्या पदरचे हिजडे उत्सव पाहण्यासाठी येतात. यापैकी वरच्या चबुतर्‍यावर राजाच्या जवळ क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुला याला बसवले होते. आम्हीही त्याच्या बरोबर होतो. सगळा उत्सव आणि समारंभ नीट दिसेल अशा ठिकाणी क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुलाला बसवण्यात यावे अशी राजाची आज्ञा होती.....

यानंतर पाईश तेथील महोत्सवाचे वर्णन करतो जे मूळातूनच वाचण्यासारखे आहे. पाईशचे वर्णन जालावर उपलब्ध आहे.

महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल ही आयताकृती उंच इमारत असून ती मागच्या बाजूला काही प्रचंड शिलाखंडाच्या आधाराने उभी आहे. इमारतीच्या बाहेरच दोन प्रचंड मोठे दगडी दरवाजे पडलेले आहेत. इमारतीवर जायला मध्यभागी आणि उजव्या कडेने असे दोन भक्कम दगडी जिने बांधलेले असून इमारतीच्या बाह्यभिंतीवर विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. विजयनगरच्या सैन्याचे चित्रिकरण येथे केलेले आहे. गजदळ, अश्वदळ, उष्ट्रदळ, पायदळ आदि सैन्यदळांचे विविध प्रकार येथे शिल्पांकित केलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची शिल्पे आहेत ती उंटांची. उंटांची कोरीव शिल्पे फार कमी प्रमाणात दिसतात. महाराष्ट्रात तर मी भुलेश्वर वगळता उंटांचे शिल्प इतर कोठे पाहिल्याचे मला स्मरत नाही. येथे मात्र ती विपुल प्रमाणात आहेत. अगदी ह्याच इमारतीवर नव्हे तर विजयनगरच्या इतर भग्न इमारतींवर, मंदिरांवर देखील उष्ट्रशिल्पे बघायला मिळतात. इथल्या शिल्पपटांत प्रामुख्याने कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे चित्रण केलेले आहे.

महानवमी डिब्ब्याजवळील दोन प्रचंड दगडी दरवाजे

a

महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल

a

महानवमी डिब्ब्याच्या सर्वात खालच्या थरातील विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन

a

शिकारीचे दृश्य आणि त्याखालच्या पटात कोरलेले परकिय प्रवासी

a

महानवमी डिब्ब्याच्या विविध थरांचे नक्षीकाम आणि शिल्पकाम

a

शिकारीचे दृश्य

a

हे बहुधा विवाहाचे दृश्य असावे

a

महानवमी डिब्ब्याच्या सर्वात उच्च स्थानावरुन शाही केंद्राच्या आजच्या भग्नावस्थेचे दृश्य

a

महानव्मी डिब्ब्याच्या उजवीकडेच एक रचना लक्ष वेधून घेते ती आहे पायर्‍या पायर्‍यांची पुष्करिणी आणि पाणी खेळवण्यासाठी बांधलेले दगडी पाइप्स.

पुष्करिणी

शाही केंद्रातले हे एक अनोखे स्थापत्य आहे. पाच ते सहा विविध थरांनी बनलेली पायर्‍या पायर्‍यांची सुंदर रचना असलेली ही चौकोनी पुष्करिणी. पावसाळ्यात ही पूर्ण भरुन जाई. पण त्यानंतर तिचे पाणी आटल्यावर ती पुन्हा भरण्यासाठी विजयनगरच्या राजांनी लांबवर असलेल्या बंधार्‍यातून दगडी पाईप्सद्वारे येथे पाणी खेळवलेले होते. पुष्करिणीत पाणी आणण्यासाठी एक दगडी पाईप मुख्य रांगेला जोडला असून पाणी खेळवण्यासाठी एक दगड तिथल्या खाचेत बसवला जाई जेणेकरुन पाणी पुढे जायला अवरोध होऊन सर्व पाणी पुष्करिणीत जमा होई. हेच दगडी पाईप इतर ठिकाणी पाणी पुरवून पुन्हा भूमिगत होत व दुसर्‍या ठिकाणी परत बाहेर निघत. येथीलच हजारराम मंदिराच्या आवारात हे दगडी पाईप परत बाहेर निघालेले मी पाहिले आहेत.

पायर्‍या पायर्‍यांची पुष्करिणी

a

दगडी पाइप्समधून पुष्करिणीत पाणी खेळवण्यासाठी केलेली नळासारखी रचना

a

भूमिगत झालेले पाणी खेळवण्याचे दगडी पाईप्स

a

महानवमी डिब्ब्याच्या समोर आणि पुष्करीणीच्या दगडी पाइप्सच्या कडेकडेने पुढे जाताच अजून एक अनोखी रचना सामोरी येते ते म्हणजे भूमिगत खलबतखाना.

भूमिगत खलबतखाना

हा खलबतखाना जमिनीच्या आत खोदलेला असून आत जाण्यासाठी उंच उंच पायर्‍या उतराव्या लागतात. आतमध्ये बोळकांडेसदृश रस्ता असून मध्यभागी खलबतखाना आहे. त्याच्या बाजूने आतल्या अंधार्‍या बोळकांडातून गेल्यास अक्षरशः भुलभुलैयाचा अनुभव येतो. आपण अंधारातून अचान्क कुठे बाहेर पडतो ते पटकन कळतच नाही.
विजयनगरच्या राजांची मंत्र्यांसोबत येथे गुप्त खलबतं चालत असंत असे मानले जाते पण अनेकानेक उत्तमोत्तम इमारती असताना राजाला अशा अंधार्‍या, भूमिगत आणि लहानश्या जागी खलबतं करायची गरजच काय हा प्रश्न मला येथे पडतो. ही बहुधा खजिन्याची किंवा काही वस्तू ठेवायची जागा असावी असे मला वाटते.

गुप्त खलबतखाना

a

खलबतखान्यात जाण्यासाठी असलेले अंधारी प्रवेशमार्ग

a

ह्या खबतखान्याच्या शेजारीच आहे ते वीर हरिहराच्या राजवाड्याचे भग्नावशेष

वीर हरिहर राजवाडा

आजमितीस ह्या राजवाड्याचा फक्त चौथराच शिल्लक असून मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना हत्तींची जोडगोळी आहे. हा वीर हरिहर म्हणाजे हरिहर दुसरा. हा पहिल्या बुक्करायाचा मुलगा. ह्यानेच मदुराईच्या सुलतानाचा पराभव करुन मदुराईचे राज्य विजयनगरला जोडले.

वीर हरिहर राजवाड्याचे भग्नावशेष

a

ह्यानंतर समोर येते एक भव्य रचना ती आहे राजाचा जनता दरबार.

राजाचा जनता दरबार.

ही देखील इतर इमारतींप्रमाणेच एक भग्न झालेली इमारत आहे. नावाप्रमाणेच हा विजयनगरच्या राजांचा हा जनता दरबार. एका प्रचंड चौथर्‍यावर स्थित ही एक दुमजली इमारत असावी. राजाचे आसन दुसर्‍या मजल्यावर उंचभागी होते. ह्या दरबारात जनतेची गार्‍हाणी ऐकून विजयनगरचे राजे न्यायनिवाडा करत असत. महानवमी डिब्बा तसेच ह्या जनता दरबारातून शाही केंद्राच्या भग्नावशेषांचे उत्तम दर्शन होते. तेव्हाच्या समृद्धीची उत्तम कल्पना आजही येथे जाऊन करता येते. ह्या जनता दरबाराच्या बाहेरच एक प्रचंड आयताकृती दगडी डोणी असून ती बहुधा घोडेस्वारांना पाणी पिण्यासाठी असावी असे वाटते.

पाणी साठवण्याची आयताकृती दगडी डोणी

a

जनता दरबारातील राजाचे उच्चासन

a

जनता दरबारातून दिसणारे भग्नावशेष

a

जनता दरबारातून दिसणारा भग्न तट आणि महानवमी डिब्बा

a

जनतादरबारातून दिसणारे हजारराम मंदिर

a

राजवाडा केंद्रातील काही भग्नावशेष

a--a

ह्या व्यतिरिक्तही इकडे काही महत्वाच्या इमारती आहेत उदा. सरदारांची घरं, सैनिकांच्या बराकी, धान्याची बळदं, नाण्यांची टांकसाळ पण वेळेअभावी इकडे जायला जमले नाही. आता पुढचे आकर्षण होते ते इथले सुप्रसिद्ध असे हजारराम मंदिर. हे इथलं एक प्रमुख आकर्षण,. रामायणातील सर्व प्रसंगांची हजारावर शिल्पं असणारं एक देखणं मंदिर. त्याविषयी पुढच्या भागात.

a

क्रमशः

 हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

 हजारराम मंदिर

हजारराम मंदिर, विजयनगरच्या ऐन शाही परिसरातील हे मंदिर, साहजिकच हे बांधले गेले ते सम्राटांचे खाजगी मंदिर म्हणूनच. विजयनगरच्या संगम राजघराणातल्या देवराय दुसरा ह्याने हे मंदिर बांधले ते लहान स्वरूपात. तेव्हा मंदिर फक्त सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह इतकेच मर्यादित होते. नंतरच्या सम्राटांनी अधिकची भर घालून आजचे शिल्पसमृद्ध मंदिर आकारास आणले. हा देवराय दुसरा (१४२४ ते १४४६) हा संगम घराण्यातला एक सर्वश्रेष्ठ राजा. इराणवरुन आलेल्या अब्दुर रझाक ह्या प्रवाशाने ह्या देवरायाचे साम्राज्य गुलबर्गा ते श्रीलंका आणि ओरिसा ते मलबार इतके विस्तारित होते असे वर्णिले आहे. तर समकालीन युरोपियन प्रवासी निकोलो कोंतीच्या म्हणण्यानुसार ह्या देवरायाने श्रीलंका, ब्रह्मदेश, केरळ आणि तामिळनाडूतून खंडणी गोळा केली होती.

हंपीच्या भग्न अवशेषांत हजारराम मंदिर शोधणे तसे सोपे आहे. शाही परिसरातून अंतःपुरात जाणारा रस्ता हा हजारराम मंदिरावरुनच जातो. शाही परिसरातूनही हे मंदिर दूरवरुनही नजरेच्या टप्प्यात सतत येत असते. शाही परिसरात हिरवळ दिसते ती हजारराम मंदिर परिसरातच. हजारराम मंदिर तटबंद असून मंदिराच्या तटाच्या बाह्यभिंतींना विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन केलेले असून आतील बाजूच्या भिंतींवर आणि मंदिराच्या बाह्यांगावरही रामायणातील प्रसंगांचे अंकन केलेले दिसते. हजारराम मंदिराचे स्थापत्य द्राविड पद्धतीचे असून सभामंडप (मुखमंडप), अंतराळ आणि गर्भगृह असून डाव्या व उजव्या बाजूस अर्धमंडप आहेत. मंदिराच्या डाव्या मागील बाजूस महामंडप असून (असे मुख्य मंदिरापासून बाजूस असलेले मंडप हंपीच्या बहुतेक सर्वच प्रमुख मंदिरात दिसतात) उजव्या बाजूस सालंकृत देवी मंदिर आहे. इथल्या मुखमंडपातील स्तंभ मात्र वालुकाश्मांचे नसून काळे कुळकुळीत दगडांचे (बहुधा ग्रॅनाइट) आहेत.

हजारराम मंदिराचे प्रवेशद्वार

a

मंदिरतटाच्या बाह्य भिंतीवर असलेले विजयनगरच्या सैन्याच्या शिल्पांकन

a

मंदिराच्या प्रवेशद्वारात एका बाजूला महिषासुरमर्दिनी तर दुसर्‍या बाजूस भैरव आहेत.

महिषासुरमर्दिनी व भैरव

a-a

मंदिराच्या आवारात पूर्वी एक स्तंभ होता असे दिसते पण सध्या केवळ स्तंभपीठ अस्तित्वात असलेले दिसते. प्रवेशद्वारातून आत येताच रामायणातील शिल्पांचा एक विस्तृत पटच नजरेसमोर उभा राहतो. पाच शाह्यांकडून जवळपास ६ महिने विजयनगर लुटलं जात असूनही इथलं अगदी थोडकी त्यातही मंदिराच्या मुखमंडपाच्या शिखरभागाची शिल्प सोडून इतर शिल्प भग्न नाहीत. ह्याचं कारण मात्र त्या शाह्यांच्या सरदारांमध्ये हिंदू सरदारही बरेच असावेत असे अनुमान काढता येते. अर्थात ही शिल्प जरी भग्न केलेली नसली तरी त्याचं उट्टं गर्भगृहातील मूर्ती भग्न करुन काढलेलं दिसतं कारण येथील बहुतांश प्रमुख मंदिरात गाभार्‍याती मूर्ती दिसत नाहीत. त्या एकतर भग्न केलेल्या असाव्यात किंवा किंवा गर्भगृहात गाय वगैरे मारुन मंदिर वाटवलं असावं त्यामुळे गावकर्‍यांनी मुख्य मूर्ती इतरत्र सुरक्षित ठिकाणी लपवल्या असाव्यात किंवा स्थापित केल्या असाव्यात. ह्याच कारणांमुळे प्रमुख विरुपाक्ष मंदिर आणि उड्डाण वीरभद्रासारखी काही लहान मंदिरे सोडली तर इकडील मंदिरात कुठेच नित्यपूजा होत नाही.

मुखमंडपाच्या शिरोभागावरची भग्न शिल्पे

a

मंदिराचे मुखदर्शन

a

मंदिररचना

a

रामंदिर व देवीमंदिर

a

मंदिरावरील शिलालेख व बांगड्यांची नक्षी

a

राममंदिर व देवीमंदिर मागील बाजूने

a

राममंदिर

a

चला आता मंदिराच्या बाह्य भिंतीवरील रामायणातील काही प्रसंग पाहूयात.

दशरथाकडून श्रावणाचा वध.

सर्वात खालच्या पट्टीकेत दिसतोय तो श्रावणबाळ आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला चालला आहे. वाटेत त्यांना तहान लागली म्हणून तो तिथेच एका तलावावर पाणी भरण्यासाठी जात आहे , त्याच्या तांब्याच्या गुडगुडण्याने आवाज होऊन मृगयेसाठी आलेल्या दशरथाला कुणी जनावर पाण्यावर आलंय असा भास होऊन तो शब्दवेधाने बाण मारत आहे. तो बाण श्रावणाच्या वर्मी लागून तो मृत्युपंथाला लागलेला असून दशरथ अपराधी भावनेने त्याच्याकडे येत आहे. ह्याच्याच बाजूच्या शिल्पपट्टीकेत श्रावणाच्या वृद्ध आईबापांनी दशरथाला शाप दिल्याचे शिल्पांकन आहे.

श्रावणवध

a

पायसदान

राजा दशरथाने ऋषी ऋष्यश्रृंगांच्या साहाय्याने पुत्रक्कामनेपोटी पुत्रेष्टी यज्ञाचे अनुष्ठान केले. यज्ञातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले आणि त्याने दशरथाला सुवर्णामयी भांड्यात पायस देउन ते राण्यांना अर्पण करण्यास सांगितले. खीरीचे सेवन करुन तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. कौसल्येपोटी राम, सुमित्रेपोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकयीपोटी भरत जन्माला आला. पुत्र थोडे मोठे होताच ऋषि विश्वामित्र राक्षसवधांसाठी राम लक्ष्मणाची मागणी करण्यास दशरथाकडे आले.

ह्या छायाचित्रात डावीकडे यज्ञपुरुष (अग्नी) दशरथाला पायसदान करताना. येथे अग्नीची वृषभमुखी शिल्प कोरलेले आहे हे विषेश. ऋग्वेदात अग्नीला वृषभ म्हणलेले आहे (अग्नीवृष). मधल्या पटात दशरथ तिन्ही राण्यांना खीर देताना व सर्वात डावीकडे विश्वामित्र दाशरथींची मागणी करताना.

a

अगदी हाच प्रसंग मंदिराच्या तटाच्या आतील बाजूस देखील कोरलेला आढळतो. अर्थात हे शिल्पांकन विजयनगरच्या देवरायानंतरच्या राजांच्या काळात झालेले आहे हे आधी सांगिलेलेच आहे.

a

अहिल्योद्धार आणि राक्षसवध

मारीच आणि सुबाहू हे राक्षस विश्वामित्राच्या यज्ञात सतत विघ्न आणत असल्याने विश्वामित्राने दशरथाकडून त्याचे दोन पुत्र राम लक्षण राक्षसवधासाठी मागून घेतले आहेत. विश्वामित्र आश्रमाच्या वाटेवर असताना वाटेत गौतमाच्या शापाने शिळा झालेल्या अहल्येचा रामाच्या स्पर्शाने उद्धार होतो व त्या शिळेवाटे अहल्या आपल्या मूळच्या स्त्रीरुपात प्रकट होते.

a

राम लक्ष्मणांकडून सुबाहू आणि इतर राक्षसांचा वध होताना. मारीच मात्र जखमी होऊन लंकेला पळून जातो.

a

सीतास्वयंवर.

राक्षसवधानंतर विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत येतात. तिथे विश्वामित्राच्या आज्ञेने सीतास्वयंवरासाठी शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावणे हा पण पूर्ण करण्यासाठी राम धनुष्य उचलून प्रत्यंचा लावण्यास जाताच धनुर्भंग होतो. सीता रामाचा पती म्हणून स्वीकार करते.

a

a

बालकाण्डातील हा संपूर्ण प्रसंग असलेला शिल्पपट

a

कैकयी प्रसंग

चारही भावांचे विवाह होऊन श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी अयोध्येत सुरु होते त्याच वेळी मंथरा कैकयीचे कान भरते आणि भरतासाठी राज्यपद व रामाला वनवास हे दोन वर दशरथाकडे मागण्यास प्रवृत्त करते.

कैकयी आणि मंथरा ---------------------------------------------------------------------------------------------------------कैकयी आणि दशरथ

a-a

सीताहरण

शूर्पणखेचे नाक कान लक्ष्मणाने छाटल्यावर ती खर दूषण आदी राक्षसांना राम लक्ष्मणांना खाऊन टाकण्यास सांगते. खर-दूषणासहित १४ सहस्त्र राक्षसांचा राम लक्ष्मण संहार करतात त्यामुळे शूर्पणखा रडत रडत लंकेत रावणाकडे जाऊन रामाला मारण्यास सांगते, रावण बधत नाही हे पाहून ती शेवटी सीतेच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करुन रावणाच्या मनात सीतेविषयी अभिलाषा उत्पन्न करते. लंपट रावण मारीचाला मायावी रूपाने रामास सीतेपासून दूर नेण्यास सांगतो व एकाकी सीतेला पळविण्यास प्रवृत्त होतो.
मायावी कांचनमृगाला पाहून सीता त्याजवर आकर्षित होते व हट्टाने रामास त्या मृगास धरुन आणण्यास फर्मावते. मायावी सुवर्णमृग रामाच्या बाणाने घायाळ होऊन "धाव लक्ष्मणा" असा आर्त टाहो फोडून सीतेचे हृदय विकल करतो. व्याकुळ सीता तिच्या संरक्षणासाठी थांबलेल्या लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास सांगते. सीतेची आज्ञा प्रमाण मानून त्याच वेळेस रावण एका साधूचे रूप घेऊन सीतेच्या कुटीसमोर येतो व भिक्षेच्या मिशाने तिचे हरण करतो. सीतेला पळवून नेत असतानाचा जटायु सीतेला वाचवण्यासाठी रावणावर झडप घालतो व रावण आपल्या खड्गाने जटायुचा वध करतो.

सुवर्णमृगाला पाहून सीतेचे आकर्षित होणे व रामाच्या समजावण्यारही तिने हट्टाने रामाला त्याला धरुन आणण्यास पाठवणे.

a

सुवर्णमृगाचा वध व राम लक्ष्मणांची भेट

a

रावण साधूवेषाने येऊन सीतेचे हरण करतो

a

जटायुवध

a

वालीवध

सीताहरणानंतर शोकाकुल अव्स्थेतील राम लक्ष्मण ऋष्यमूक पर्वताजवळ येतात. त्या शस्त्रधारी वीरांना पाहून भयभीत झालेला सुग्रीव हनुमानास श्रीरामांची भेट घेण्यास पाठवतो. सुग्रीव आणि श्रीराम ह्यांमध्ये मैत्र उत्पन्न होऊन सुग्रीवाची पत्नी रुमाला बळकावून आणि त्याला राज्याबाहेर हाकलून किष्किंधेत असलेल्या वालीला मारण्याची ऋष्यमूक पर्वतावरील वानरराज सुग्रीव श्रीरामाला विनंती करतो व सीतेचा शोध घेण्याच्या कामी मदत करण्याचे आश्वासन देतो. त्याच वेळी वालीच्या सामर्थ्याला भिऊन असलेला सुग्रीव रामाच्या बलाची परीक्षा घेतो. ती परीक्षा म्हणजे मातंग पर्वतावरील महाप्रचंड दुंदुभी दैत्याचा सांगाडा दूर फेकणे व त्यानंतर एकाच वेळी सात साल वृक्षांमधून तीर मारणे. रामाने हा पराक्रम अगदी सहजी केल्याचे पाहून सुग्रीव वालीवधाविषयी निश्चिंत होऊन किष्किंधेत जाउन त्याला ललकारतो. त्यांचे द्वंद्वयुद्ध चालू असतानाच राम वृक्षाआडून बाण मारुन वालीवध करतो व मरणोन्मुख वालीला उपदेश करतो.

श्रीराम लक्ष्मणांची हनुमान भेट. (इथे अर्धचंद्र बाणाची प्रतिमा उल्लेखनीय आहे)

a

रामाची सुग्रीवाकडून परिक्षा (उजवीकडे), मध्यभागी मरणोन्मुख वालीला उपदेश करताना राम, शेजारी रडत असलेली वालीपत्नी तारा व कुमार अंगद

a

अशोकवन प्रसंग व सेतूबंधन

सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान दक्षिण समुद्र उल्लंघून लंकेत येतो. तेथे अशोकवाटिकेत सीतेची भेट घेतो व लवकरच श्रीराम सैन्यासह येऊन तुझी सुटका करतील असे बोलून सीतेस आश्वस्त करतो. आपली ओळख पटवैण्यासाठी सीता आपला चूडामणी हनुमानास देते, तदनंतर अशोकवनाचा विध्वंस करुन हनुमान किष्किंधेस परत येतो.

सीता आपला चूडामणी हनुमानास देताना
a

सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले श्रीराम वानरसैन्यासह समुद्रावर दगडांचा सेतू बांधून लंकेवर चालून जातात.

सेतूबंधन

a

युद्धकाण्ड

वानरसैन्याचे रावणाच्या राक्षससेनेबरोबर तुंबळ युद्ध होते. १० दिवस युद्ध चालून देवांतक, नरांतक, अतिकाय, प्रहस्त, कुंभकर्ण, इंद्रजित असे महान रावणसेनाधिपती एकेक करुन मारले जातात व दहाव्या दिवशी रामाच्या हस्ते रावणवध होतो.

युद्धातील काही प्रसंग

a

युद्धातील काही प्रसंग

a

युद्धातील काही प्रसंग

a

रावणवध

a

देवीमंदिरात लवकुशांची शिल्पे देखील आहेत असं समजलं होतं पण दुर्दैवाने त्याचा गाभारा बंद असल्याने ती काही पाहता आली नाहीत.

शिल्पपटांची रचना

a

शिल्पपटांची रचना

a

शिल्पपटांची रचना

a

येथे रामायणातील शिल्पे जरी सर्वाधिक असली तरी काही मोजकी शिल्पे कृष्णाची देखील आहेत.

विविध शिल्पे

बाळकृष्ण, विष्णू, हनुमान अशी शिल्पे

a

अष्टभुज श्रीकृष्ण

a

ही सर्व शिल्पे बाह्य बाजूने बघत बघत आम्ही मंदिराच्या सभामंडपात गेलो. सभामंडपतले काळे कुळकुळीत स्तंभ उल्लेखनीय आहेत. स्तंभावर विष्णूचे अवतार, कृष्ण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत.

सभामंडप

a

स्तंभावरील विष्णूचा भविष्यातील १० वा अवतार कल्कीची प्रतिमा. हाती ढाल, तलवार, शंख, चक्र धारण करुन कल्की घोड्यावर आरुढ आहे.

a

कृष्ण आणि विष्णू

a-a

गाभारा कुलूपबंद असल्याने आत जाता आले नाही पण आतमध्ये एक पीठासन असून त्याजवर तीन खड्डे आहेत अशी माहिती समजली त्यावरुन येथे पूर्वी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या प्रतिमा होत्या हे सहज समजते.

देवीमंदिर

a

मंडप

विजयनगरच्या मंदिरातील उल्लेखनीय प्रकार म्हणजे मंदिराच्या बाजूस असलेले मंडप. ते येथेही आहेत. मंडपात राजाची प्रजेबरोबर भेट, देवाच्या नैवेद्यासाठी पाकसिद्धी, यात्रेकरुंच्या विश्रामासाठी व्यवस्था अशा विविध सोयी केलेल्या असत. बहुतेक मंडपांना कल्याणमंडप असे संबोधले जाते.

कल्याणमंडप

a

मंडप

a

हजारराम मंदिरात देखील दगडी पाईपांद्वारे पाणी खेळवले होते, पाणी साठवण्यासाठी येथे एक लहानशीच परंतु १०/१२ पुरुष खोल विहिर खणण्यात आली होती जी आजही येथे अस्तित्वात आहे.

a

ही ह्या मंदिरावरील काही मोजकी शिल्पे. रामायणातील इतरही शेकडो शिल्पे येथील भिंतींवर आहेत पण विस्तारभयास्तव सर्वांचे वर्णन तसेच छायाचित्रे येथे देता येणे शक्यच नाही.

हजारराम मंदिर बघून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या समोरच एक ध्वजस्तंभ आहे. ते ठिकाण म्हणाजे पान सुपारी बाजार.

पान सुपारी बाजार.

पान सुपारी बाजार हे हंपीतील प्रमुख बाजारांपैकी एक. इतर प्रमुख बाजार म्हणजे विरुपाक्ष मंदिरासमोरील हंपी बाझार, कृष्णपुर्‍यातील कृष्ण बाजार, विठ्ठलपुर्‍यातील विठ्ठल बाजार आणि अच्युतराय मंदिरासमोरील सुले बाजार. पानसुपारी बाजाराचा उल्लेख देवरायाच्या एका शिलालेखात आढळतो. आज येथे फक्त भग्न अवशेष आहेत. पान सुपाॠ बाजार ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे येथे एक उंच ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या बाजूलाच पूर्वीच्या बाजारपेठेचे अवशेष आहेत.

ह्या बाजारपेठेला पान सुपारी बाजार नाव पडण्याचे कारण बहुधा येथे पूर्वी सुपारीची भरपूर झाडे होती हे असावे. विजयनगरला भेट देणार्‍या परकीय प्रवाशांनी येथील रहिवाश्यांचे पान खाण्याचे वर्णन केले आहे. त्यात येथील लोक एक प्रकारचे पान खाउन स्वत:ची तोंडे लाल करुन घेतात असे लिहिलेले आहे. आजही येथे सुपारीची झाडे आहेत.

पान सुपारी बाजारातील ध्वजस्तंभ

a

पान सुपारी बाजाराचे अवशेष

a

पान सुपारी बाजाराचे अवशेष

a

इतकं सगळ बघून होईता दुपारचे जवळपास अडीच तीन वाजले होते. आता जेवण करुन जायचे होते ते हंपीपासूनच जवळच असलेले एक अनोखे आकर्षण बघायला. ते म्हणजे भारतातील एकमेव असलेले अस्वल अभयारण्य. अर्थात दरोजी स्लॉथ बेयर पार्क. त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

 दारोजी अस्वल अभयारण्य

 दारोजी अस्वल अभयारण्य हे हंपीच्या अगदी जवळ म्हणजे सुमारे १५ किलोमीटर अंतरावरच आहे. हे भारतातलं पहिलं अस्वल अभयारण्य. ह्याची स्थापना १९९४ साली झाली. इथला जंगलभाग आपल्या नेहमीच्या दाट जंगलांसारखा नाही. तो बहुतांशी खुरड्या, काटेरी झुडुपांचा आहे. किंबहुना इथले खडकाळ जमिनीवर झाडी उगवणेही तसे अशक्य. तथापी आज इथे ही जी वनसंपदा दिसतेय ती वनखात्याच्या अथक परिश्रमाने, कारण ही इथली झाडी नैसर्गिक नाहीत, अथक वनीकरण करुन आजची इथली समृद्ध हिरवी वनसंपदा निर्माण केली गेली आहे. इथल्या टेकड्यांवरील प्रचंड मोठ्या दगडांत असलेल्या कपारींत अस्वलांना लपायला मुबलक जागा आहे. जवळपास दोनशे अस्वले येथल्या परिसरांत आहे असे सांगण्यात येते. ह्या अस्वल अभयारण्याला काहीसा पौराणिक आधार देखील आहे. किंष्किंधा नगरीपासून (हंपी) जवळ असलेले ऋक्षराज जांबवंतांचे राज्य येथलेच असे येथे मानले जाते. अस्वलांशिवाय येथे मोर, माकडे,बिबटे, कोल्हे, मुंगूस, रानडुकरे आदी प्राणी सुद्धा येथे आढळतात. मोर आणि रानडुकरे तर येथे विपुल प्रमाणात आहेत.

आम्ही हंपीहून येथे येण्यासाठी दुपारी साडेतीनला निघालो ते जेमतेम अर्ध्या तासात दारोजी अस्वल अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचलो. दारोजी अभयारण्यात यायचे असेल तर दुपारीच यावे लागते कारण हे अभयारण्य सकाळी खुले नसते. ह्याची वेळ आहे दुपारी २ ते संध्याकाळी ६. स्वतःचे वाहन असेल तर येथे येणे अत्यंत सोयीचे आहे. ते जर नसेल तर हंपीहून भाड्याने कार किंवा रिक्षासारखी वाहतुकीची साधने मिळू शकतात पण ते खूप महाग जाते. अर्थात हंपीहून येथे भाड्याने बाईक घेउन येणे स्वस्त पडते. अभयारण्यात प्रवेश फी ही एका चारचाकी वाहनाला ५०० रु. आणि प्रती माणशी ५० रु. अशी आहे जी अर्थातच खूप जास्त वाटते. येथे तिकिट घेऊन आणि वनखात्याच्या नोंदवहीत नोंद करुनच आपल्याला पुढे जाता येते.

अभयारण्यातील रस्ता हा कच्चा आहे. ह्या रस्त्याने जातांना असंख्य मोर आपल्या दृष्टीस सतत पडत असतात. मात्र अस्वलांच्या मुख्य प्रदेशाच्या गाभ्यात जायचे रस्ते हे विविध प्रवेशद्वारे तसेच कुंपणे लावून प्रवेश प्रतिबंधित केलेला आहे. सर्वसामान्यांना अस्वलांचे निरिक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारापासून सुमारे ४ किलोमीटर वनखात्याने एका टेकडीवर एक निरीक्षण मनोरा बांधलेला आहे. टेकडीवर जाणार्‍या सुमारे सत्तर पायर्‍या चढून आणि प्रचंड मोठ्या खडकांमधून वाट काढतच आपला प्रवेश निरिक्षण मनोर्‍यावर होतो. मनोर्‍याच्या समोरच सुमारे २००/३०० मीटर असणार्‍या टेकड्यांवरील खडकांच्या कपारींत अस्वलांचे वास्तव्य आहे. ही अस्वले जर बघायची असतील तर आपल्याजवळ उत्तम दर्जाची दुर्बिण किंवा टेलीफोटो लेन्स असलेला कॅमेरा असणे अत्यावश्यक आहे. ही साधने जर आपल्याजवळ नसतील तर येथे येऊच नये असे मी म्हणेन कारण येथून जी अस्वले किंवा इतर प्राणी दिसतात ते अक्षरशः एखाद्या ठिपक्यासारखे दिसत असतात. इथल्या विस्तृत परिसरातील राखाडी, तांबड्या हिरव्या रंगाच्या नैसर्गिक कॅमोफ्लाजमुळे प्राणी दुरुन पटकन ओळखणे सुद्धा अवघड होते.

निरिक्षण मनोर्‍याकडे जाणारा रस्ता

a

मनोर्‍यावरुन दिसणार्‍या खडकाळ टेकड्या (ह्याच कपारींमध्ये अस्वलांचे वास्तव्य आहे)

a

अर्थात अस्वले जरी येथून लांबवर दिसत असली तरीही येथे अस्वले दिसण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कारण वनखात्याचे लोक दुपारी येउन येथील कपारींनजीकच्या खडकांवर गूळ, मधाचे मिश्रण पसरवून जातात. दुपारी चारच्या सुमारास हे मिश्रण खाण्याच्या मिषाने अस्वले हमखास बाहेर पडतात व त्यांचे दर्शन आपणांस होते. मला व्यक्तिशः हे असे मिश्रण खाण्यास देणे आवडले नाही कारण त्याने प्राणी परावलंबी होऊन स्वतःचे अन्न स्वत: मिळवण्याच्या दृष्टीने अक्षम होतात. अर्थात इथल्या ओसाड, रूक्ष भागामुळे प्राण्यांना नैसर्गिक अन्न मिळवणे तसेही अवघडच आहे.

मनोर्‍यावरुन चहुबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. इथल्या भव्य प्रस्तरांत, खुरट्या झाडीत एक वेगळेच सौंदर्य आहे. मधूनच एखादा तांबट पक्षी कुटुर्र कुर्र अशी साद घालत होता. तर कुण्या जोडीचे प्रणयाराधन चालले होते.

a

a

तर वेडा राघू झाडाच्या फांदीवर ध्यानस्थ बसून भक्ष्य टिपण्याची वाट बघत होता.

a

हे पक्षी दिसत असतानाच समोरील कपारीमधून अस्वल चालत आले. ही भारतीय काळी अस्वले संथ असतात, गूळ, मध, फुले, किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य. सहसा शांत असलेली ही अस्वले ही प्रसंगी खूप हिंसक होतात. त्यामुळे ह्यांच्या जवळ न जाणेच हिताचे.

कपारीतून बाहेर आलेले अस्वल

a

a

a

तुम्ही जर नशिबवान असाल तर तुम्हाला येथे एक अविस्मरणीय दृश्य दिसू शकते ते म्हणजे पिल्लांसहित असलेल्या अस्वलमादीचे. आमचे नशिब जोरावर असल्याने आम्हाला दोन पिल्लांसह बाहेर आलेल्या मादीचे दृश्य पाहावयास मिळाले. पिल्लांसह असलेली अस्वलमादीचे दृश्य बघणे हे वर्णनातीत असते कारण मादी आपल्या पिल्लांना पाठुंगळी घेऊन हिंडत असते. मध्येच पिल्लांचे तिच्या पाठीवरुन उतरणे, परत तिच्या पाठीवर बसण्याची चढाओढ बघायला फार मजा येते.

दोन पिल्लांसह असलेली अस्वल मादा

a

a

आईच्या पाठीवर बसण्यासाठी होणारी चढाओढ

a

a

a

अस्वलबाळांच्या लीला पाहात असतानाच एक भला थोरला रानडुक्कर नजरेस पडला. इतका भलाप्रचंड डुक्कर मी आयुष्यात ह्याआधी कधी पाहिला नव्हता. दूर अंतरावरुनही तो अगदी सुस्पस्टपणे दिसत होता.

a

a

a

रानडुकराच्या आजूबाजूने मोर सुखैनैव चरत होते.

a

a

थोड्यावेळाने डोंगरकडा उतरुन रानडुक्कर थेट रस्त्याजवळ आला आणि तिथल्या दगडांवर आपले सुळे घासू लागला

a

सुळ्यांना धार करुन झाल्यावर तिथल्या दगडांवर फासलेले गूळ मधाचे मिश्रण खाऊ लागला

a

a

इतक्यात भर उन्हाळ्यातही एक मोर पिसारा फुलवून नाचू लागला

a

इकडे लांबवर अस्वले दिसतच होती.

a

मध्येच एखादा मोर डौलदारपणे फिरत होता.

a

हे सर्व बघता बघताच सूर्य मावळू लागला व आम्ही निघायची तयारी सुरु लागलो. मगाशी वर सांगताना एक महत्वाची गोष्ट विसरलो. येथे येताना पाण्याची बाटली आणणे आवश्यक आहे कारण संपूर्ण अभयारण्यात पिण्याच्या पाण्याची सोय कुठेही नाही.

इथल्या समृद्ध वनप्रदेशाचे अल्पसे दर्शन घेऊन आम्ही साधारण सहा साडेसहाला येथून निघालो ते साडेसातपर्यंत कमलापूरला आलो. हॉटेलवर जरा फ्रेश होऊन आम्ही निघालो ते इथल्या सुप्रसिद्ध अशा विरुपाक्ष मंदिरात जायला. हंपीचा इतर सर्व परिसर गडद काळ्या अंधारात बुडून जात असताना इथले चैतन्य रात्रीही सुरु असते ते आजही एका प्रमुख देवस्थानांमध्ये गणल्या जाणार्‍या विरुपाक्ष मंदिरात. त्याविषयी पुढच्या भागात.

a

क्रमशः

 विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी

 

विरुपाक्ष मंदिर परिसर

a

दारोजी अस्वल अभयारण्यात जाऊन आम्ही परत कमलापूरच्या केटीडीसीला परत आलो, थोडा वेळ आराम करुन परत हंपीच्या विरुपाक्ष मंदिरास जाण्यास निघालो. दिवसा उजाड, वैराण असणारा हंपीचा परिसर रात्री निबीड अंधारात बुडून जातो, कमलापूर हंपी रस्त्यावर असलेले प्रचंड प्रस्तर रात्रीच्या आंधारात विलक्षण गूढ वाटू लागतात. वाटेत लागणार्‍या उड्डाण वीरभद्र मंदिरात मात्र काहीतरी जाग दिसत असते. हंपीतील आजही पुजल्या जाणार्‍या अत्यल्प मंदिरांपैकी उड्डाण वीरभद्र मंदिर हे एक. उड्डाण वीरभद्र मंदिर ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे मंदिर संपूर्ण पांढर्‍या रंगात रंगवलेले आहे शिवाय मंदिराच्या पुढ्यात एक दीपस्तंभ आहे. शिवाय येथे पूजा सुरु असल्याने आसमंतात प्रार्थनेचे सुर घुमत असतात. ह्या मंदिराच्या समोरच आहे ते चंडिकेश्वर मंदिर. चंडिकेश्वर मंदिरही अप्रतिम शिल्पकलेने नटलेले आहे. वेळेअभावी आम्हाला ह्या दोन्ही मंदिरांत जाता आले नाही. ह्या मंदिरांच्या नंतर रात्री आकाश उजळलेले असते ते थेट विरुपाक्ष मंदिर परिसरात. आजचे हंपी गावही ह्या मंदिराच्या बाजूलाच पसरलेले आहे. विरुपाक्ष मंदिर हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक, ह्यामुळे देशातील विविध प्रांतातील यात्रेकरुंची येथे सतत ये जा असते. विरुपाक्ष मंदिराच्या मुख्य गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच यात्रेकरुंची गर्दी झालेली तेथे आढळून येते. मुक्कामाचे यात्रेकरु मंदिराच्या प्रांगणात, शतस्तंभी मंडपात आपली पथारी टाकून झोपायच्या तयारीत असतात, तर काहींची शतस्तंभी मंडपाच्या बाजूलाच असलेल्या भोजनशाळेत त्यांच्या स्वयंपाकाची तयारी चालू असते. अर्थात हे विरुपाक्ष मंदिरातील रात्रीचे दृश्य. मंदिर जर अतिशय निवांतपणे पाहायचे असेल तर ते रात्रीच पाहावे कारण यात्रेकरुंची गर्दी रात्री तुलनेने कमी असते आणि जी असते ती मुख्य गोपुर आणि रायगोपुर ह्यांच्या मधील प्रांगणात. अर्थात रात्री मंदिर पाहण्याचा एक तोटा म्हणजे रंगमंडप आणि कल्याणमंडपातील शिल्पं पुरेशा प्रकाशाअभावी बारकाईने पाहता येत नाहीत.
साधारण रात्री साडेसाठच्या आसपास आम्ही विरुपाक्ष मंदिरात पोहोचलो, यात्रेकरुंची थोडीशी गर्दी ओलांडून आतल्या गोपुरातून रंगमंडपात आणि गर्भगृहात गेलो, मंदिराचे पुजारी खूप सहकार्य करणारे दिसले. गर्भगृह सोडून मंदिराच्या अंतराळातील शिल्पांची छायाचित्रे त्यांच्या परवानगीने विनासायास काढता आली. विरुपाक्ष मंदिर संकुलातील मुख्य मंदिराच्या बाजूलाच पंपा आणि भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे जे चालुक्य कालीन आहे. त्यांचे स्तंभ, मंदिरातील शिल्पे ह्यावरुन त्यांचा काल सहजीच लक्षात येतो. रात्री गेल्यास हे सर्व मंदिर संकुल अगदी निवांतपणे बघता येते. विरुपाक्ष मंदिर पाहून बाहेर आलो आणि मंदिराच्या उजव्या बाजूस असणार्‍या हंपी गावात शिरलो.
हंपी गाव म्हणजे तीनचार समांतर गल्ल्या असणारं लहानसं गाव. विरुपाक्ष मंदिराच्या दोन्ही बाजूला हंपी गाव पसरलेले आहे. डाव्या बाजूस थोडेसे घरगुती निवास आहेत. शेजारीच बस स्टॅण्ड आणि किरकोळ दुकाने आहेत तर मुख्य गाव हे मंदिराच्या उजवीकडील बाजूस आहे. येथेही पर्यटकांसाठी घरगुती निवास आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही किंवा जे बॅकपॅकर्स म्हणून आलेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी हे निवास उत्तम आहेत. हंपीच्या ऐन गाभ्यात स्वस्त आणि साधी राहण्याची सोय. इथल्याच एका उपाहारगृहात आम्ही जेवायला गेलो ते म्हणजे मॅन्गो ट्री रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट तिथले प्रसिद्ध. जेवायला बसण्याची इथली पद्धत वेगळी, गाद्या वगैरे घातल्या आहेत त्यावर मांडी घालून बसायचे नाहीतर निवांत पसरायचं, पुढ्यात ओटे आहेत. त्यावर ताट ठेवून निवांत जेवायचं. इथे आणि हंपीमधील इतरही काही रेस्टॉरन्ट्स मध्ये इस्रायली आणि लेबानीज खाद्यपदार्थ मिळतात तेही माफक दरांत. इथे जेवून अंधारात बुडालेल्या रात्रीच्या हम्पीच्या अवशेषांतून जाणार्‍या रस्त्याने परत कमलापूरला आलो. हंपीतील पहिला दिवस संपला होता आता दुसर्‍या दिवशी सकाळी परत विरुपाक्ष मंदिरातच यायचे होते.

विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर

सकाळी लवकरच आवरुन परत विरुपाक्ष मंदिरात आलो. सातव्या शतकातलं हे मंदिर. चालुक्यांनी बांधलेलं. त्या काळापासून हे मंदिर एक प्रमुख धर्मस्थळ आहे जे आजही कार्यरत आहे. त्याकाळी हे मंदिर लहानसे होते मात्र चालुक्यांनंतर होयसळांनीही मंदिराच्या कामात भर घातली व विजयनगरच्या राजवटीत विरुपाक्ष मंदिराला आजचे भव्यदिव्य स्वरुप प्राप्त झाले.
विजयनगरचे हे गोपुर अतिशय भव्य. ९ मजली, ते ही दुमजली अशा दगडी अधिष्ठानावर आधारलेले. वरच्या ९ मजल्यांच्या बांधकामात विटांचे बांधकाम आहे व त्यावर द्राविडी पद्धतीचा कळस आहे. गोपुराच्या प्रत्येक थरांवर देवदैवतांची शिल्पे, सुरसुंदरी आणि मैथुनशिल्पे देखील आहेत. आजच्या हंपीतील सर्वात प्रमुख वास्तुशिल्प असेल ते हे गोपुर. हे इतके उंच आहे की ते हंपी गावातून कुठूनही नजरेत भरते. ह्या गोपुराचा जीर्णोद्धार विजयनगरच्या सर्वात प्रसिद्ध सम्राटाने कृष्णदेवरायाने केला. रायाच्या कारकिर्दित विजयनगरची स्थापत्यकला कळसास पोहोचलेली होती.

विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

गोपुरावरील विष्णू, मुरलीधर, शिव, गणेश आदी देवताशिल्पे

a

गोपुरावरील भैरव आणि त्याच्या उजवे बाजूकडील एक मैथुनशिल्प

a

प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच गोपुराच्या खालच्या दगडी थरांतही काही शिल्पपट आहेत. त्यातील एक म्हणजे मार्कंडेयनुग्रह शिवमूर्ती किंवा कालारी शिव. मार्कंडेयाचे अल्पायुष्य संपल्याने त्याला नेण्यास आलेल्या यमाचे म्हणजेच साक्षात कालाचे पारिपत्य शिव करतो त्याची ही कथा

कालारी शिव

a

गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत येत्याच डाव्या बाजूच्या सज्जात भैरवाची एक मूर्ती आहे. द्वारातून आपला प्रवेश एका भव्य प्रांगणात होतो. उजव्या बाजूच्या भिंतीत १४ हात असलेली एक देवी, मयुरारूढ कार्तिकेय आणि विजयनगरचे राजचिन्ह कोरलेल्या तीन विविध शिळा बसवलेल्या आहेत.

विजयनगरचे राजचिन्ह चालुक्यांच्या राजचिन्हात किरकोळ बदल करुन घडवलेले दिसते. वराह, चंद्र, सूर्य आणि सरळ पात्याचा खंजीर. विजयनगरचे राजे हे वैष्णव असल्याने त्यांच्या राजचिन्हावर वराह असणे साहजिकच आहे. आजही हंपीत सर्वाधिक मंदिरे ही वैष्णव देवतांची आहेत म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल, बालकृष्ण, विष्णू इत्यादी.

विजयनगरचे राजचिन्ह

a

ह्याच्या समोरील बाजूस म्हणजेच द्वारातून आल्यावर डाव्या बाजूस तीन शिरे आणि एकच धड असलेल्या नंदीची एक अनोखी मूर्ती आहे. सहसा त्रिमुखी नंदी कुठे दिसत नाही.

त्रिमुखी नंदी

a--a

आतील प्रांगणाच्या डाव्या बाजूस शंभर स्तंभ असलेला सभामंडप किंवा कल्याणमंडप आहे. बहुतांश यात्रेकरुंचा मुक्काम येथेच असतो.

कल्याणमंडप

a

प्रांगणाच्या समोरील बाजूस रायाने-कृष्णदेवरायाने बांधलेले तीनमजली गोपुर आहे. ह्या गोपुरातून आत जाताच आपला प्रवेश श्री विरुपाक्ष मंदिराच्या रंगमंडपापाशी होतो. ह्या तीमजली गोपुरावरही विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. ह्या गोपुरातून आत येताच दोन्ही बाजूस मंडप, समोर प्रांगण, प्रांगणाच्या शेवटी रायाने बांधलेला रंगमंडप आणि रंग मंडपाच्या उजव्या बाजूस विरुपाक्षाची पत्नी पंपा अथवा भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. प्रांगणात दिपमाळ, बलीस्तंभ आणि नंदीमंडप आहेत.

रायगोपुर

a

(डावीकडून) रंगमंडप, पंपादेवी मंदिर, नंदीमंडप आणि बलीस्तंभ

a

दिपमाळ

a

कल्याणमंडप, रायगोपुर आणि मुख्य गोपुर

a

प्रांगणाच्या डाव्या बाजूकडील शतस्तंभी कल्याणमंडप

a

ह्यानंतर आपला प्रवेश होतो ते रंगमंडपात.

रंगमंडप
रंगमंडप हा विरुपाक्ष मंदिराच्या गर्भगृहाला जोडला गेलेला आहे. ह्याचे बांधकाम कृष्णदेवरायाने शके १५८८ मध्ये केले ( इस. १५१०) तशा अर्थाचा शिलालेख रंगमंडपाच्या बाहेर कोरून ठेवण्यात आलेला आहे. रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावर शिव पार्वती आदी मूर्ती आहेत तर खालच्या बाजूस ससा, मगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अश्या विविध प्राण्यांपासून निर्मित केलेल्या व्यालाकृती आहेत. हीच ती प्रसिद्ध विजयनगर शैलीतील रचना. हंपीतील इतर मंदिरांतही ह्या आगळ्या वेगळ्या शैलीतील व्यालशिल्पे दृष्टीस पडत जातात. हंपीतील जवळपास सर्वच मंदिरातील स्तंभांवर हे व्याल व त्यावर आरूढ झालेल्या स्वारांची कित्येक शिल्पे आहेत.

रंगमंडपाचे मुखदर्शन

a

रंगमंडपावरील शिवपार्वती प्रतिमा

a

सम्राट कृष्णदेवरायाचा शिलालेख

a

रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावरील व्यालशिल्प

a

रंगमंडप ३८ स्तंभांवर तोललेला असून त्यावर बाळकृष्ण, कृष्ण, मर्कटे, लक्ष्मीनृसिंह, गायवासरु अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर छताच्या बाजूच्या भिंतींवर विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. रंगमंडपातील सर्वात महत्वाचे आणि आवर्जून बघण्यासारखे म्हणजे येथील छतांवर चितारलेली भित्तीचित्रे. विष्णूचे दशावतार, द्रौपदीविवाहप्रसंगी अर्जुनाने केलेला मत्स्यभेद, मदनाने केलेल्या शिवाच्या तपस्येचा भंग इत्यादी खास विजयनगर शैलीत असलेली विविध रंगीत चित्रे येथे आहेत.

स्तंभावरील भारवाहक यक्ष

a

स्तंभशिल्पे

a

लक्ष्मी नृसिंह

a

छताच्या खालील बाजूकडील अनंतशयनी विष्णू

a

दशावतार भित्तीचित्र

a

मदनाने पुष्पबाणाद्वारे केलेला शंकराचा तपोभंग. मदनाच्या रथाला जोडलेले शुक येथे स्पष्ट दिसत आहेत.

a

शिवपार्वती विवाह (डाव्या बाजूस चतुर्मुखी ब्रह्मा आणि विष्णू आहेत)

a

अर्जुनाने केलेला मत्यभेद

a

द्रौपदीस्वयंवर

a

हे बहुधा कृष्णदेवरायाचे स्वारीचे किंवा हरिहर-बुक्काचे गुरु विद्यारण्य ह्यांच्या मिरवणुकीचे चित्रण असावे.

a

रंगमंडपाच्या शेवटी असलेले पुरुषमृग आणि नागशिल्प

a

रंगमंडप ओलांडून आपला प्रवेश अंतराळात होतो. अंतराळ म्हणजे गर्भगृह आणि रंगमंडप किंवा सभामंडप ह्याच्या दरम्यानचा लहानसा भाग. येथे गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस शैव द्वारपाल आहेत तसेच दोन्ही बाजूस अर्धमंडपही आहेत. अंतराळातील स्तंभांवर काही अनोख्या प्रतिमा आहेत.

ऋषी शिल्प

a

शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करणारी गाय

a

पुरुषमृग
पुरुषमृग प्रतिमा ही शुद्ध दाक्षिणात्य. अर्धा मनुष्य आणि अर्धा मृग असलेला हा काल्पनिक प्राणी शिवाचा मोठा भक्त समजला जातो.

a

कन्नप्पा नयनार

हा ६३ नयनारांपैकी एक असलेला शिवाचा प्रमुख भक्त. हा एक शिकारी असून शिवलिंगाला शिकार केलेले प्राणी अर्पण करत असे. एकदा शंकराने ह्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. कन्नपा पुजित असलेल्या शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. शिवाचा डोळा जखमी झालेला असून त्यातून वाहत असलेले रक्त थांबत नाही हे बघून कन्नप्पाने धारदार पात्याने स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाच्या डोळ्याच्या जागी लावला त्यामुळे त्या डोळ्यातून वाहणारे रक्त थांबले मात्र त्याचवेळी शिवलिंगावरील दुसर्‍या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. हे पाहून कन्नप्पाने आपला दुसरा डोळाही काढण्याचे ठरवले. दोन्ही डोळे गेल्यामुळे शिवलिंगावरील रक्त वाहणार्‍या दुसर्‍या डोळ्याची जागा दिसणार नाही हे पाहून त्याने आपला एक पाय लिंगावरील डोळ्याच्या ठिकाणी ठेवला व आपला दुसरा डोळाही काढू लागला. त्याच्या ह्या अपूर्व भक्तीने शंकराने प्रकट होऊन त्याचे दोन्ही डोळे पुनर्स्थापित केले व त्याला आपल्या प्रमुख नयनारांमध्ये स्थान दिले.

कन्नपा नयनार प्रसंग

a

गर्भगृहात शिवलिंग असून त्याचे छायाचित्र घेता येत नाही.

रंगमंडपाच्या उजव्या बाजूस पंपादेवी आणि भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. आतील भागातील कलाकुसर ही चालुक्य शैलीतील आहे. गर्भगृहाच्या द्वारांवर पौराणिक प्रसंगांचा शिल्पपट आहे व आतमध्ये भुवनेश्वरी देवीची मूर्ती आहे. विरुपाक्ष मंदिराच्या प्रमुख गोपुरानंतर ह्या मंदिराचे शिखर सर्वात उंच आहे.

पंपादेवी मंदिराचे शिखर

a

मंदिरातील पौराणिक प्रसंग

a

ह्या मंदिराच्या बाजूला एक भुयारी मार्ग असून आतमध्ये शिवलिंग आहे. ह्याच्याच बाजूला म्हणजे विरुपाक्ष मंदिराच्या उजवीकडील कोपर्‍यात एक नवल पाहायलाच हवे असे आहे. मात्र ते दिसण्यासाठी तुम्हाला मंदिरात सकाळी दहा-अकराच्या सुमारास पोचावे लागेल. मंदिर संकुलाच्या इकडील भागात एक लहानशी खोली असून पूर्वेकडील म्हणजेच गोपुराच्या बाजूस खोलीच्या भिंतीस अस लहानसे छिद्र आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सकाळच्या सुमारास सूर्यकिरण येथील छिद्राद्वारे खोलीत प्रवेश करतात आणि गोपुराची उलटी प्रतिमा छिद्राच्या विरुद्ध बाजूकडील भिंतीवर पडते.

गोपुराची उलटी प्रतिमा

a

मंदिराच्या मागील बाजूस स्वामी विद्यारण्यांचे एक लहानसे मंदिर आहे.

मंदिरातून बाहेर आलो, आता उन्ह अगदी रणरणत होतं. मंदिराच्या शेजारीच एक लहानशी टेकडी आहे. विरुपाक्ष मंदिर संकुलाचे सर्वात सुंदर दृश्य जर कुठून दिसत असेल तर ते येथूनच.

हेमकूट टेकडी

विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस ही टेकडी, पूर्णपणे खडकाळ, टेकडीवर जायला एका भल्यामोठ्या सपाट पाषाणावरुनच चढावे लागते. चढावर, टेकडी सर्व बाजूंनी तटबंद आहे. आज ह्याचा काही भाग उद्ध्वस्त झालेला आहे. टेकडीवर जाताना भव्य प्रवेशद्वारे, चौकीची संरक्षक मेटं, आणि असंख्य मंदिरे आहेत. ह्या सर्वापेक्षाही देखणे आहेत ते इथले भव्य प्रस्तर. मॅजेस्टिक..! खडकांचं हे सौंदर्य अफलातून आनंद देतं.

हेमकूट टेकडी

a

हेमकूट टेकडीवर जाण्यासाठी असलेला भव्य प्रवेशदरवाजा

a

हेमकूट टेकडीवरील काही अवशेष

a

टेकडीवरील मेट

a

टेकडीवरील मंदिरसंकुल

a

हेमकूटावरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

टेकडीवरील भव्य प्रस्तर

a

वरील छायाचित्राचाच एक क्लोजअप

a

प्रस्तरांच्या खोबणीत खुबीने लपलेले एक स्थापत्य. हंपीतील स्थलदर्शनात अशी आगळीवेगळी स्थापत्ये कित्येकदा नजरेस पडत जातात.

a

प्रस्तरांतूनच बांधण्यात आलेली तटबंदी

a

हेमकूट टेकडीवरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिर संकुल

a

हेमकूटावरुन दिसणारा विरुपाक्ष मंदिराच्या पुढ्यातील परिसर आणि हंपी किंवा विरुपाक्ष बाजाराचे अवशेष

a

हेमकूट टेकडीच्या पायथ्याच्या दुसर्‍या बाजूस कडलेकलू गणेश मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे कृष्ण मंदिरावरुन जो रस्ता विरुपाक्ष मंदिराकडे येतो त्या रस्त्याच्या चढावर आहे. येथून उतरत्या रस्त्याने विरुपाक्ष मंदिरात पोहोचता येते. कडलेकलू गणेश मंदिर एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. मंदिरातील सभामंडपातील असंख्य स्तंभांवर सुंदर शिल्पे आणि गाभार्‍यात सुमारे १५ फूट उंचीची एकपाषाणी भव्य गणेशमूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपातून विरुपाक्ष मंदिर, उंच मातंग टेकडी, हंपि बाजार आणि सभोवतलाच्या प्रचंड प्रस्तरखंडांचे अफलातून दृष्य दिसते.

कडलेकलू गणेश मंदिर

a

मंदिरातील स्तंभांवरील शिल्पे

a--a

गणेशमूर्तीचे छायाचित्र घेण्याचे मजकडून राहूनच गेले, कसे राहिले माहित नाही पण राहून गेले हे खरे. कदाचित मला गाभार्‍यातील प्रमुख मूर्ती टिपण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळेही असेल.

हे सर्व पाहता पाहताच दुपारचे १२ वाजून गेले होते, उन्हाचा तडाखा जबर बसत होता. सकाळी नाष्टा भरपूर झाल्याने भूक अशी फारशी लागली नव्हती तेव्हा जेवणाआधी कृष्ण मंदिर आणि हंपीतील सुप्रसिद्ध अशा उग्रनृसिंह (लक्ष्मीनृसिंह) मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याविषयी पुढच्या भागात,

क्रमशः

बाकी काही शंका अहेत : विजापुरच्या आदिलशाहीच्या तडाख्यातुन हे सारे वाचलेच कसे ? ही मंदिरे बांधायला ह्यांच्याकडे इतका पैसा कोठुन आला ? ह्यांच्याकडेही राष्ट्रकुटांप्रमाणे अफाट व्यापारौदीम चालु होता काय ?  


विजापुरच्या आदिलशाहीच्या तडाख्यातुन हे सारे वाचलेच कसे ?

तो मोठा इतिहास आहे. दक्षिण भारतात त्यावेळी दिल्लीच्या सुलतानांचे राज्य होते, शिवाय येथे त्यांचे मांडलिक पण होते. तुघलकाने कांपिलीच्या राजाचा पराभव करुन तिथे मुसलमानी राज्याची स्थापना केली. हरिहर व बुक्कराय हे याच कांपिलीच्या राजाचे किंवा होयसळांचे सरदार होते असे म्हणतात. स्वामी विद्यारण्यांच्या प्रेरणेने हिंदू धर्माची रक्षा करण्याच्या हेतूने हरिहर आणि बुक्काने १३३६ साली विजयनगरच्या स्वतंत्र राजवटीची स्थापना केली. बुक्काने मदुराईच्या सुलतानाचा पराबव करुन तो भागही आपल्या साम्राज्याला जोडला. ह्याच सुमारास दिल्लीच्या सुलतानांपासून फुटून हसन गंगू बहमनीने बहमनी राजवटीची स्थापना १३४७ साली केली. तुंगभद्रा आणि कृष्णेच्या मधील प्रदेशांतील वर्चस्वासाठी ह्या दोन राजवटीत सतत लढाया होत असत. ह्याच दरम्यान बुक्करायाचे वंशजांनी विजयनगरचा अंमल गोवे, मदुराई, इतर दक्षिण भारत येथे प्रस्थापित केला. पुढे तुळुव घराण्याचा विजयनगरच्या पराक्रमी सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दित विजयनगरचा प्रचंड विस्तार झाला तो असा पूर्वेकडे ओरिसा, पश्चिमेकडे भटकळ-होनावर, उत्तरेकडे रायचूर आणि मुद्धल आणि दक्षिणेत थेट दक्षिण समुद्रापर्यंत. विजयनगरच्या राजांबरोबरच्या सततच्या लढायांमुळे आणि बहमनी राजवटीतील अंतर्विरोधामुळे त्या राजवटीची १४२५ मध्ये शकले होउन निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बेरीदशाही ह्या पाच स्वतंत्र शाह्या दख्खनमधे निर्माण झाल्या. विजयनगरच्या तुलनेत साहजिकच त्यांचे सामर्थ्य कमीच होते. खुद्द कृष्णदेवरायाने रायचूर जिंकून विजापुरच्या वेशीवर धडक देऊन आदिलशाहा शरण आणले होते. कृष्णदेवरायाच्या मृत्युनंतर विजयनगरचे सामर्थ्य कमजोर होत गेले. घराण्याची सत्ता अच्युतरायानंतर जावई(अलिया) रामरायाकडे गेली (अराविडू घराणे). रामराया पाच शाह्यांमधल्या भांडणाचा फायदा घेत कधी इकडे तर कधी तिकडे असा मदत करुन ह्या शाह्यांना एकमेकांशी लढवत ठेवून त्यांना झुलवू लागला. विजयनगरची संपत्ती व वैभव बघून ह्या पाच शाह्या १५६५ मध्ये एकत्र आल्या आणि तालिकोटची सुप्रसिद्ध लढाई झाली. आदिलशाहाशी तह असल्याने आदिलशाहा इतरांना मदत करणार नाही ह्या विश्वासाने रामराया काहीसा गाफिल राहिला. तो युद्धात मारला गेल्याने वर्चस्व असूनही फौजेची पळापळ झाली व मुसलमान विजयनगरात घुसले, तब्बल ६ महिने शहराची लुटालुट चालूच होती. अर्थात ह्या पराभवानंतरही विजयनगरचे साम्राज्य लयाला गेलेच नाही पण विजयनगर उर्फ हंपी ही राजधानी ओसाड, उद्ध्वस्त झाली. तिरुमलदेवाने राजधानी पेनुकोंडाला हलवली. मात्र हळूहळू त्यांचे साम्राज्य क्षीण होत गेले, सामंत, नायक बळजोर झाले आणि फुटून निघत गेले. शेवटचा वंशज श्रीरंग रायल ह्याची इकडे तिकडे खूपच परवड झाली आणि त्याच्या मृत्युने १६४६ साली विजयनगरचा शेवटचा दुवाहीनिखळून पडला.

ही मंदिरे बांधायला ह्यांच्याकडे इतका पैसा कोठुन आला ? ह्यांच्याकडेही राष्ट्रकुटांप्रमाणे अफाट व्यापारौदीम चालु होता काय ?

साम्राज्य बळजोर होत गेल्यावर पैसाही आपोआप येतोच. विजयनगरच्या सम्राटांचा व्यापार चीन, श्रीलंका, अरब, इराणी लोकांशी सतत चालू असे. विजयनगरच्या वैभवाचे वर्णन दुमिंगुश पाईश, फेर्नांव नुनिझ, निकोलाय कोंन्ती अशा विविध प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केलेले आहे ते मूळातून वाचण्यासारखे आहे.

 कुठे काय आहे आणि कसे जाता येईल एवढ्यावरच मी तो भाग पाहून निभावले होते. ते आता पाहतो आहे.
१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे होती इत्यादी.
२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?
३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात (उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे आहे?
४) गावातच राहिल्याने रात्रसंचार करता आला ते महाभाग्यच.
५) फोटो चांगले वाटले तरी एक उणीव म्हणजे वाईड लेन्झमध्ये करेक्शन पाहिजे. खांबवगैरे फारच तिरपे होत आहेत.
६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?
७) कडलेकालू या मोठ्या गणेश मंदिराच्या बाजूलाच एवढाच मोठा ससिवेकालू गणेश आहे. गणेशाला असे अगदी सुरुवातीलाच ठेवले आहे.
८) एकूण सर्वच परिसर, मंदिरे नास्तिकालाही आस्तिक करून टाकतात अशी रचना आहे हे नि:संशय.
९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!. तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला. 

 

१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे होती इत्यादी.

कन्नप्पा नयनारचा प्रसंग नेमका कोणता हे मी थेट विरुपाक्ष मंदिराच्या पूजार्‍यांनाच विचारले होते, त्यांनी तो प्रसंग सविस्तर वर्णन करुन सांगितला. आपल्य पुराणांत कन्नपा नयनार मिळणार नाही, दाक्षिणात्य मूर्ती आहे.

२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?

होता की, भैरवाचे वाहन कुत्रा हे आहे तर चामुंडा काही वेळा शृगालावर आरुढ दिसते. पुराणातील शुनःशेप आणि श्वानाची कथा प्रसिद्ध आहे, महाभारतातही स्वर्गारोहणपर्वात धर्मराजाच्या कुत्र्याचा उल्लेख आहे अर्थात प्रक्षिप्त. भैरवाच्या जोडीला कुत्र्याची शिल्पे पुष्कळ आहेत.

३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात (उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे आहे?

तिथे एक आहे आणि तुम्ही म्हणताय ते मंदिर म्हणजे उत्किर्णित विष्णू मंदिर (inscribed Vishnu temple). तुलादानकमानीच्या समोरच आहे ते.

६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?

हो, काही प्रवेशद्वारांवर गणेश दिसतोच. शिवाय ससिवेकलू आणि कडलेकलू अशी गणेशाच्या भव्य मूर्ती असलेली दोन स्वतंत्र देवळे आहेतच.

९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!. तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला.

लाकडी रथ दुर्दैवाने एकही दिसला नाही.

कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर

 

कृष्ण मंदिर अर्थात बाळकृष्ण मंदिर

कमलापूरवरुन जाताना हंपीच्या मुख्य रस्त्यावरच आहे हे कृष्ण मंदिर. रस्त्याच्या उजवीकडे राजवाड्यांचा विभाग (Royal Enclosure) आहे तर त्याच्या पुढे गेल्यास रस्त्याच्या डावीकडे पहिले मोठे मंदिर लागते ते कृष्ण मंदिर. विरुपाक्ष मंदिरापासून हे मंदिर अगदीच जवळ आहे.

कृष्ण मंदिर हे पंचायतन स्वरुपात असलेले एक भव्य मंदिर. हे मंदिर सम्राट कृष्णदेवरायाने इस १५१३ साली त्याच्या उत्कल स्वारीतल्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.

पोर्तुगीज प्रवासी फेर्नांव नूनीझच्या वृत्तांतात कृष्णदेवरायाच्या ओरिसा स्वारीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे येतो.

कृष्णदेवरायाने गादीवर येताच आपला साम्राज्यविस्तार सुरु केला. ओरीसावर स्वारी करुन त्याने उदयगिरीच्या किल्ल्याला ३४००० पायदळ आणि ८०० हत्तींसह वेढा घातला. किल्ल्यात १०००० सैन्याची शिबंदी होती आणि किल्ला अतिशय मजबूत होता. सुमारे दीड वर्ष वेढा घालून रायाने किल्ल्यात जाण्याच्या असंख्य वाटा तयार केल्या,मोठमोठे दगड फोडून मार्ग तयार केले, किल्ल्यात जाणारी एकमेव वाट जी अतिशय अरुंद आणि दुर्गम होती ती त्याने सुगम करुन घेतली आणि किल्ला जिंकला आणि ओरिसाच्या राजाच्या आत्याला कैद केले.. उदयगिरीचा किल्ला जिंकल्यावर रायाने कोडवीडवर स्वारी करुन त्याला वेढा घातला. ओरिसाचा राजा तेराशे हत्ती, वीस हजार घोडदळ आणि पन्नास हजार पायदळासह चालून आला. हे पाहून रायाने शहरात काही सैन्य ठेवून नदीपाशी आपला तळ उभारला. ओरिसाचा राजा नदीच्या दुसर्‍या तीरावर ससैन्य उभा होता. तो नदी ओलांडून येत नाही हे पाहताच रायाने नदी ओलांडून त्याच्यावर स्वारी केली आणि घमासान लढाईत उत्कलराजाचा पराभव केला. राया नंतर कोंडापल्ली ह्या ओरिसाच्या राजधानीच्या ठिकाणी गेला आणि तीन महिने वेढा घातल्यावर त्याने राजधानी जिंकली. आणि ओरिसाच्या परागंदा राजास मी तुझी येथे रणभूमीवर वाट पाहात आहे असे कित्येक निरोप पाठवले, पण तो कधीच आला नाही, कोंडापल्लीस रायाने अनेक मंदिरांना देणग्या दिल्या. तिथे एक भव्य मंदिर बांधून त्याने एक शिलालेख रोविला तो असा, 'कदाचित ही अक्षरे जेव्हा मिटून जातील तेव्हा ओरिसाचा राजा विजयनगरच्या राजाशी सामना करेल, ओरिसाच्या राजाने जर ही अक्षरे मिटवली तर त्याच्या राणीस विजयनगरच्या राजाच्या घोड्यास नाल ठोकणार्‍या लोहारांच्या हाती दिले जाईल'.
ह्यानंतर ओरिसाच्या राजाने तह करुन सम्राट कृष्णदेवरायास आपली मुलगी दिली, रायाने पण तीचा पत्नी म्हणून स्वीकार करुन उत्कल राजाला नदीपलीकडचा मुलुख परत करुन नदीअलीकडचा मुलुख स्वतःकडे ठेवला.

कृष्णमंदिरातली मुख्य मूर्ती हि बाळकृष्णाची होती जी आज तेथील मंदिरात नसून चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातील आतल्या भागावर कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे प्रसंग कोरलेले आहेत.

कृष्ण मंदिर

a

गोपुरातील आतील भागांवर असलेले विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन

a

पंचायतन स्वरुपातल्या या मंदिरात काही उपमंदिरे, उपमंडल, पाकशाळा आहेत. मुख्य मंदिराच्या तलविन्यासात एक गर्भगृह जिथे बाळकृष्णाची मूर्ती होती, एक अर्धमंडप, महामंडप आणि तीन बाजूंना खुला असणारा भव्य सभामंडप आहे. हंपीतील बर्‍याच मंदिरांची रचना काहीशी अशीच आहे. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच एक शिलालेख असून त्यावर मंदिर निर्माण आणि उत्कल प्रदेशावरील विजयाबद्दल लिहिलेले आहे.

कृष्ण मंदिर प्रांगण आणि शिलालेख

a

शिलालेख

a

कृष्ण मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सभामंडपातील स्तंभावर असलेल्या प्रचंड व्यालमूर्ती. व्याल हे सिंहासारखे काल्पनिक पशू. हे दुष्ट शक्तींना प्रतिबंध करतात अशी समजूत.

स्तंभांवरील व्याल

a

स्तंभांवरील व्याल
a

कृष्ण मंदिरातील सभामंडपा हा अनेक स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांवर कृष्णाच्या जीवनातले असंख्य प्रसंग कोरलेले आहेत. हे मंदिर बाळकृष्णाचे असल्याने त्याचे गोकुळातील आणि मथुरेतील प्रसंगच येथे प्रामुख्याने आहेत.

कृष्णमंदिरातील सभामंडप

a

सभामंडप एका वेगळ्या कोनातून

a

बाळकृष्णास उखळाला बांधल्याचा प्रसंग

a

कालियामर्दन

a

सिंहासनावर बसलेल्या कंसाचा केश ओढून कृष्णाने केलेला वध

a

मंदिराच्या शिखरांवर गरुड, दशावतार अशी विविध शिल्पे आहेत.

a

मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण

a

मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आणि उपमंडप

a

मुख्य मंदिर आणि उपमंदिरं

a

मुख्य मंदिर, उपमंडप आणि उपमंदिर

a

मंदिर बघून बाहेर आलो, रस्त्याच्या पलीकडील बाजूस आहे तो असंख्य मंडपांनी, दुकानांनी युक्त असलेला कृष्ण बाजार, एकेकाळी गजबजून गेलेला हा कृष्ण बाजार आज भग्नावस्थेत आहे.

कृष्ण बाजार

a

कृष्णबाजारातील पुष्करिणी आणि दुकांनातील स्तंभ

a

ह्यानंतर आम्ही निघालो ते येथून अगदी जवळच असलेल्या हंपीतील प्रसिद्ध लक्ष्मीनृसिंहाकडे


लक्ष्मीनृसिंह अर्थात उग्रनृसिंह मंदिर

हंपीतील ही सर्वात विशाल मूर्ती. हंपी म्हटल्यावर दोन गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात, एक विठ्ठल मंदिरातील दगडी रथ आणि दुसरी म्हणजे उग्रनृसिंहाची ही भव्य मूर्ती. ही उग्रनृसिंहाची मूर्ती लक्ष्मीनृसिंहाची होती, आजमितीस लक्ष्मी पूर्णपणे भग्न झालेली असून तिचा फक्त एक हात आपल्याला दिसतो. मूळचा लक्ष्मीनृसिंह हळूहळू उग्रनृसिंह म्हणून प्रचलित झाला.

६.७ मीटर उंच असलेली ही मूर्ती इस १५२८ साली सम्राट कृष्णदेवरायाच्या आदेशाने एका भव्यशिलाखंडावर कोरण्यात आली आणि कृष्णभट्टाच्या हस्ते हिची प्रतिष्ठापना करण्यात आली.

लक्ष्मी-नृसिंह

a

शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. नृसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या सात फण्यांच्या साहाय्याने छ्त्र धरिले आहे. नृसिंह चतुर्भुज असून त्याचे चारही हात भग्न आलेले आहेत. त्याच्या डावी मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून आज केवळ तिच्या उजव्या हाताचा भाग नृसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लपेटलेला दिसतो. दाक्षिणात्य पद्धतीचा मुगुट घालून बसलेल्या नृसिंहाचे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असून त्याच्या कराल दाढा विचकलेल्या आहेत. शेषनागाच्या वेटोळ्याच्या बाजूस मकरतोरण आहे.

लक्ष्नीनृसिंह

a

उजव्या बाजूस लक्ष्मीचा हात दिसत आहे.

a

ही मूळ मूर्ती कशी असावी ह्याची काहिशी कल्पना आपल्याला येथीलच विरुपाक्ष मंदिरातील स्तंभावर असलेल्या लक्ष्मीनृसिंहाच्या मूर्तीवरुन येते.

a

ह्या मूर्तीच्या शेजारीच आहे ते बडवीलिंग मंदिर


बडवीलिंग मंदिर

हे मंदिर अगदीच छोटेखानी पण इथले शिवलिंग हंपीतील सर्वात भव्य. दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर. अगदी साध्याश्याच असलेल्या ह्या मंदिरात एकाच पाषाणापासून तयार केलेले ३ मीटर उंचीचे भव्य शिवलिंग आहे. शिवलिंगावर शंकराचे तीन डोळे कोरलेले आहेत. जवळच असलेल्या लहानश्या कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते. एका गरीब शेतकरी स्त्रीने हे शिवलिंग स्थापित केले अशी दंतकथा आहे. बडवा म्हणजे गरीब म्हणूनच याचे नाव बडवीलिंग पडले असे मानतात.

लक्ष्नीनृसिंह आणि बाजूलाच असलेले बडवीलिंग मंदिर

a

बडवीलिंग मंदिर

a

पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग

a

शिवलिंगावर कोरलेले शंकराचे तीन डोळे

a

हंपीतील हा भाग आहे विलक्षण सुंदर, एका बाजूला शाही निवास तर दुसर्‍या बाजूस केळीच्या हिरव्यागार बागा. इथल्या कालव्यामुळे हा भाग अतिशय हिरवागार आहे. ही मंदिरे बघेपर्यंत जवळपास दीड वाजत आले होते, उसाचा रस पिवून आम्ही आता परत निघालो ते कमलापूरला दाक्षिणात्य पद्धतीच्या मेसमध्ये जेवायला, त्यानंतर जायचे होते ते शाहीभागात कमलमहाल, हत्तीपागा बघायला त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

अंतःपुर, पद्ममहाल आणि गजशाळा

 

हंपीचे भग्नावशेष मुख्यतः दोन भागांत विभाजित झालेले आहेत, पवित्र परिसर (sacred centre) आणि शाही परिसर (Royal centre). पवित्र परिसरात मुख्यतः मंदिरे तर शाही परिसरात राजवाडे, महाल, मंत्रालये इत्यादी आहेत. तसं बघायला गेलं तर हंपीच्या विस्तीर्ण परिसरात जिथे नजर जाईल तिथं काहीना काही अवशेष आहेतच. ह्याच शाही परिसरात आहे अंतःपुर अर्थात राणीवसा.

अंतःपुर / राणीवसा (zenana enclosure)

शाही परिसरात असलेले हे अंतःपुर हे राजपरिवारातील स्त्रियांची निवासस्थाने असलेला खाजगी भाग. चारही बाजूंनी तटबंदीने संरक्षित असलेल्या अंतःपुराला दोन प्रवेशद्वारे असून आतमध्ये राण्यांची निवासस्थाने, सुप्रसिद्ध पद्ममहाल, जलमहाल आणि पुष्करीणी आहेत. तटबंदीवर संरक्षणासाठी चार कोपर्‍यात चार उंच निरिक्षण मनोरे (watch tower) आहेत, पैकी आज तिथला एक मनोरा पूर्णपणे नष्ट झालेला असून तीन आजही अस्तित्वात आहेत. हे दुमजली मनोरे इंडोइस्लामिक शैलीत बांधलेले आहेत

हजारराम मंदिर, शाही राजवाड्यांवरुन पुढे जाताच अंतःपुर आहे. अंतःपुरात राजाशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसे व पहार्‍यावर हिजड्यांची नेमणूक केली जात असे. ह्याशिवाय अंतःपुरात देवदासींनाही प्रवेश असे. पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्याच्या वृत्तांतात ह्या स्त्रियांचे वर्णन आले आहे.

पाईश लिहितो,

देवळातल्या मूर्तीला नैवैद्य दाखवताना मूर्तीपुढे स्त्रियांचे नृत्य होते, ह्या स्त्रिया देवाला वाहिलेल्या (देवदासी) असतात. त्या देवाला अन्न इत्यादी आवश्यक वस्तू देतात. ह्या स्त्रियांना झालेल्या मुलीही देवदासीच ठरतात. ह्यांचे चारित्र्य स्वैर असते. शहरांतल्या चांगल्या भागात प्रमुख मार्गांवर त्या राहतात. अशा स्त्रियांच्या वस्तीतील घरे उत्तम प्रतीची असतात. अधिकारी आणि श्रीमंत वर्गातील अंगवस्त्रे म्हणून राहणार्‍या या स्त्रियांना बराच मान मिळतो. कोणताही सद्गृहस्थ काहीही ठपका न येता यांच्याकडे उघडपणे जाऊ शकतो. या स्त्रियांना राजाच्या अंत:पुरातही प्रवेश असतो. त्या तिथे राजस्त्रियांमध्ये राहून त्यांच्या समवेत तांबूल सेवन करतात. इतर कोणाही व्यक्तीला हे करता येत नाही मग तिचा दर्जा कितीही मोठा असो.

पाईश पुढे तांबुल (विड्याचे) वर्णन करतो ते असे,

हा विडा म्हणजे मिरवेल किंवा आपल्याकडचे आयव्हिसासारख्या वनस्पतीचे एक पान असते. हे पान येथील लोक नेहमी खातात, त्यांच्याबरोबर तोंडात सुपारी धरतात. ही आपल्याकडील मेंडलर फळासारखी मात्र जास्त टणक असते. ती श्वासदुर्गंधी घालवते आणि अनेक तर्‍हेने गुणकारी असते. खाण्याचे रिवाज आपल्यापेक्षा वेगळे असणार्‍या या लोकांना ती अनेक प्रकारे उपयुक्त आहे. काही लोक मांसाहारी आहेत पण ते गाय, डुक्कर सोडून इतर सर्व प्रकारचे मांस खातात. त्यांचेदेखील दिवसभर पान खाणे चालूच असते.

निरीक्षण मनोर्‍यांनी संरक्षित असलेले तटबंदीयुक्त अंत:पुर

a

तटबंदी व निरीक्षण मनोरा

a

पाईशच्या वृत्तांतात अंतःपुराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.

राजाला (कृष्णदेवरायाला) तीन कायदेशीर बायका असून याच तीन प्रमुख आहेत. ह्या प्रत्येक राणीचा निराळा महाल असून प्रत्येकाच्या दासदासी, नोकरचाकर आणि स्त्री अंगरक्षक आहेत. सर्व नोकर स्त्रिया आहेत. या ठिकाणी पुरुषांना मज्जाव आहे. फक्त महालांवर पहारेकरी म्हणून हिजडे आहेत. राजाच्या मर्जीतील उच्चपदस्थ वृद्ध पुरुष सोडल्यास ह्या स्त्रिया इतर कोणाही पुरुषांच्या दृष्टीस पडत नाहीत. जेव्हा त्यांना बाहेर जावयाचे असते तेव्हा पडद्याने आच्छादित केलेल्या पालखीत त्यांना घेऊन जातात. पालख्यांबरोबर चांगले तीनशे ते चारशे हिजडे असतात आणि इतर सर्व लोक लांब अंतरावर उभे राहतात. प्रत्येक राणीकडे भरपूर पैसा आणि तितक्याच प्रमाणात मोती, बाजूबंद, बांगड्या, रत्ने इत्यादी ऐवज असल्याचे आम्हास सांगण्यात आले. प्रत्येक राणीजवळ साठ दासी असून त्याही हिरे, मोती, माणके यांनी सजलेल्या असतात असे म्हणतात. या दासी धरुन अंतःपुरात एकूण बरा हजार स्त्रिया आहेत. ह्यामध्ये ढाल तलवार चालवणार्‍या, कुस्ती खेळणार्‍या, तुतारी शिंगे अशा आपल्यापेक्षा वेगळी वाद्ये वाजवणार्‍या अशा स्त्रिया आहेत. तसेच भोई आणि परीट कामासाठादेखील स्त्रियाच आहेत आणि राजाकडील व्यवस्थेप्रमाणे इथे अंतःपुरात देखील कामाची व्यवस्था आहे, एव्हढेच की ती सर्व कामेदेखील स्त्रियाच करतात. तिन्ही पट्टराण्यांकडे तंटा किंवा नाराजी होऊ नये म्हणून तिघींनाही सर्व गोष्टी सारख्या प्रमाणात मिळतात. तिन्ही राण्यांमध्ये स्नेहभाव असून त्या स्वतंत्र राहतात यावरुन एव्हढे लोक राहणारे वाडे सामावणारे हे आवार किती मोठे असेल याची कल्पना येईल.

पाईश पुढे लिहितो,

खुद्द राजा महालातच पण वेगळा राहतो. आपल्या कोणत्याही राणीस भेटण्याची इच्छा झाल्यास तो हिजड्याकरवी तसा निरोप पाठवून तिला बोलवून घेतो. राणी राहते तिथे अंतःपुरात हिजडा जात नाही. दारावरील स्त्री रक्षकांना तो राजाचा संदेश असल्याचे सांगतो. नंतर राणीची एखादी वरिष्ठ दासी येऊन राजाचा काय निरोप आहे ते पाहते आणि मगच राणी राजाकडे येते किंवा राजा राणीकडे जातो आणि इतरांना काहीही सुगावा लागू न देता तो पाहिजे तितका वेळ राणीच्या सान्निध्यात राहतो. हिजड्यांपेकी काही लोक राजाच्या खास मर्जीतील आहेत. ते राजाच्या शयनगृहातच झोपतात आणि त्यांना पगारही भरपूर मिळतो.

राणीच्या राजवाड्याचे भग्नावशेष

a

संरक्षण मनोरेयुक्त तटबंदी

a

तटबंदी आणि पुष्करिणी

a

संरक्षण मनोरा व बाजूस असणारे रंगा मंदिर

a

ह्या अंत:पुरातच आहे एक अद्वितीय वास्तु ,ती म्हणजे पद्ममहाल


पद्ममहाल (Lotus Mahal)

पद्ममहाल ही अत्यंत देखणी वास्तु, अंतःपुरात प्रवेश करताच इंडो इस्लामिक शैलीत बांधलेली ही दुमजली इमारत आपले लक्ष वेधून घेते. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित येण्यास पद्ममहालाचा वापर केला जात असावा असे मानण्यात येते. तालिकोटच्या लढाईत रामरायाचा पराभव झाल्यानंतरच्या ६ महिन्यांच्या विजयनगरच्या विध्वंसात वाचलेल्या मोजक्या वास्तूंपैकी ही एक ती बहुधा तिच्या इंडोइस्लामिक शैलीमुळेच. अर्धोन्मिलित कमलांप्रमाणे उमललेल्या एकामागे एक असलेल्या महिरपींच्या रचनेमुळेच हिला कमलमहाल अर्थात पद्ममहाल हे नाव मिळाले.

सर्व बाजूंनी देखण्या महिरपी असणार्‍या ह्या दुमजली पद्ममहालाला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना आहे. वरच्या मजल्यावरही महिरपीयुक्त सज्जे असून त्यावर पडदे टांगण्यासाठी सोयी आहेत. ह्या वास्तुच्या छताची रचना मंदिराच्या शिखरांप्रमाणे केलेली आहे.

पद्ममहाल

a

पाईशच्या वर्णनात अंतःपुरातील एका दुमजली वास्तूचे वर्णन येते, हंपीच्या शाही परिसरातील अवशेषांत एकांवर एक दालने असलेली एकच वास्तू आहे, पाईशच्या वर्णनात असलेल्या वास्तूशी पद्ममहालाचे थोडेफार साम्य आहे.

पाईश लिहितो,

या निवासात प्रवेश करताच डाव्या बाजूला एकावर एक अशी दोन दालने आहेत, ती येणेप्रमाणे- खालचे दालन जमिनीच्या पातळीपेक्षाही खाली आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या दोन पायर्‍या आहेत. येथून ते छतापर्यंत आतून सोन्याचा पत्रा जोडलेला आहे. ह्याचा बाहेरील भाग घुमटाप्रमाणे आहे. या निवासस्थानाला चार बाजू असलेली मंडपी असून ती विणलेल्या वेताची आहे. त्यावर माणिक, हिरे, मोती इत्यादिंचे रत्नखचित नक्षीकाम केलेले आहे. तिच्यावर दोन सोन्याचे गोल टांगलेले आहेत, या सुवर्णगोलांवरील जडावाचे काम बदामी आकाराचे आहे, त्यांच्यावर बारीक मोत्यांचे घट्ट्विणीचे जाळीदार नक्षीकाम केलेले आहे. घुमटावर देखील असेच गोल आहेत. या दालनात एक पलंग होता ज्याच्या पायावरील नक्षीकाम मंडपीप्रमाणे होते. पलंगाच्या उभ्या आडव्या दांड्या सोनेरी होत्या आणि त्यावर काळ्या मखमलीची गादी होती. त्याच्या चोहोंबाजूस वीतभर उंचीचा कठडा असून त्या कठड्याला मोती लावलेले होते. पलंगावर दोन तक्के असून इतर कोणतेही आच्छादन नव्हते. वरच्या दालनात काय होते ते मी सांगू शकणार नाही कारण मी ते पाहिले नाही. मी फक्त उजवीकडील खालचे दालन पाहिले. या प्रासादात कोरीव पाषाणाचे स्तंभ असलेले एक दालन आहे, वरपासून खालपर्यंत भिंतीसहित हे दालन हस्तीदंताचे बनलेले असून वरच्या तुळयांना आधार देणार्‍या गुलाब व कमलपुष्पांचे हस्तिदंती काम केलेले आहे. त्याची कारागिरी इतकी चांगली आहे हे असे काम इतरत्र आढळणे कठिण, याच बाजूस ह्या राज्यात येणार्‍या सर्व लोकांच्या, अगदी आम्हा पोर्तुगीजांपर्यंत- आयुष्याची धाटणी दाखविणार्‍या तसबिरी रंगवलेल्या आहेत. अंतःपुरातील राण्यांना त्यामुळे बाहेरील देशांतील रितिरिवाजाची माहिती होते. अंध व भिकारी ह्यांच्यासुद्धा तसबिरी आहेत. इथे दोन सोन्याची सिंहासने असून पडदे असणारा एक चांदीचा पलंग आहे. या ठिकाणी मला एक हिरव्या गारेचा लहानसा तुकडा दिसला. याला फार महत्वाचा समजतात. या पाट्याजवळ म्हणजे राजवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या कमानीखाली एक कुलुप लावलेला लहान दरवाजा होता. या ठिकाणी आत पूर्वीच्या एका राजाचा खजिना आहे असे आम्हांला सांगण्यात आले.

पद्ममहाल

a

पद्ममहाल समोरुन

a

पद्ममहाल एका वेगळ्या कोनातून

a

महिरपी रचना

a

ही देखणी वास्तू पाहून झाल्यावर आपण अंतःपुराच्या मागील भागातून बाहेर पडताच एक देखणी आणि सुपरिचित वास्तू आपल्याला सामोरी येते ती म्हणजे हत्तीपागा.


गजशाळा (Elephant Stable)

हंपीतील सुस्थितीत असलेल्या वास्तूंपैकी एक म्हणजे हत्तीपागा. घुमटाकार शिखरं असलेली हि लांबच लांब इमारत. विजयनगरच्या सम्राटांचे शाही हत्ती ठेवण्यासाठी असलेली ही गजशाळा उर्फ हत्तीपागा. एकूण ११ प्रचंड कक्ष असलेल्या ह्या गजशाळेची मधला कक्ष हा मोठा असून त्याच्यावर हिंदू पद्धतीच्या शिखराची रचना जी आज भग्न झालेली आहे. तर ह्या कक्षाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच पाच कक्ष असून प्रत्येकीचे शिखर घुमटाकार असलेल्या इस्लामिक शैलीत आहे. त्या घुमटांवर कमलपुष्पांच्या रचनेने फेर धरला आहे.

गजशाळेतील कक्षांच्या आतील बाजूस गजांना बांधण्यासाठी धातूचे आकडे असून ते आजही पाहता येतात, प्रत्येक कक्षात मागच्या बाजूस माहुतांना आत येण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे.

गजशाळा

a

a

गजशाळा

a

विजयनगरच्या गजांचे वर्णन करतांना पाईश लिहितो,

हत्तींवर झालरी असलेल्या मखमली, जरतारी झुली घातलेल्या असून शिवाय इतरही रंगीबेरंगी वस्त्रे भरपूर घातलेली असतात. वस्त्रांना दोन्ही बाजूंना लावलेल्या घटांच्या नादाने आसमंत भरुन जातो. हत्तींच्या गंडस्थळावर राक्षसमुखाची किंवा इतर अनेक मोठ्या प्राण्यांची चित्रे चितारलेली आहेत. चुणीदार अंगरखा घातलेली तीन/चार माणसे हत्तींच्या पाठीवर बसलेली असून त्यांच्या हातात ढाली, बरच्या असतात, जणू काही ते स्वारीसाठी सज्ज झालेले आहेत.

गजशाळा

a

ही गजशाळा बघून आम्ही परत फिरलो, अंतःपुर ओलांडून आलेल्या मार्गाने तटबंदीच्या बाहेर आलो. तिथेच एक पुरातत्वखात्याचे एक लहानसे खुले संग्रहालय आणि कार्यालय आहे. संग्रहालयात विजयनगरच्या भग्नावशेषांतील काही मूर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. शनिवार असल्याने संग्रहालय बंद होतं त्यामुळे आत काही जाता आलं नाही मात्र बाहेरुन जितक्या मूर्ती दिसल्या तितक्या पाहता आल्या.

संग्रहालयातील मूर्ती

a

अंतःपुर नकाशा

a

इथवर येईतो दुपारचे तीन साडेतीन वाजले होते, उन्ह अगदी रणरणत होतं. आता आमचा पुढचा टप्पा होता ते इथलं जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर त्याविषयी पुढच्या आणि शेवटच्या भागात.

क्रमशः

हंपी एक अनुभव

 कर्नाटकातले हम्पी म्हणजे मुबाईहून जवळ जवळ चौदा तासांचा प्रवास. हा प्रवास करोना नंतरच्या परिस्थितीत स्वतःच्या गाडीने करायचा म्हणजे सर्व काळजी नीट घेणं आवश्यक होतं. साधारण सातशे पन्नास किलोमीटर आहे मुंबई-हंपी अंतर. म्हणजे चौदा तास तर नक्की. मग ठरवलं मुंबई ते बेळगाव असा प्रवास करायचा आणि मग बेळगाव ते हंपी. त्याप्रमाणे तयारी केली. शक्यतोवर घरगुती राहण्याची सोय (होम स्टे) सारखं काही असल्यास पाहायचं. एकतर ते स्वस्त असतं आणि कमी लोक अशा ठिकाणी जात असल्याने सध्यासाठी योग्य असेल. मग बेळगावमध्ये home stay असं गूगल मित्रावर शोधलं आणि अनेक पर्याय मिळाले. अगदी मोठासा बंगला आणि त्यातल्या एक किंवा दोन खोल्या राहण्यासाठी देणारे पर्याय देखील होते. त्यातल्याच एका घरातली खोली फोनवरून राखून ठेवली आणि एक दिवस भल्या पाहाटे निघाले.

मुद्दाम ठरवून मुंबई-पुणे महामार्गावर थांबले नाही. पुण्याच्या पुढे महाबळेश्वरला जाण्याचे जे वळण आहे त्याअगोदर एक लहानसा मॉल आहे. तिथे पोहोचायला मला साधारण साडेचार तास लागले. तिथे थांबून व्यवस्थित खाऊन घेतले. मॉल मधील स्वच्छतागृह खरंच चांगले असल्याने काहीच प्रश्न उदभवला नाही. तिथून निघाल्यावर मात्र कुठेही न थांबता थेट बेळगाव गाठले. मुंबई-बेळगाव चारशे चौर्याऐंशी किलोमीटर्स आहे. म्हणजे साधारण आठ तास. मी मधला थांबण्याचा वेळ धरून देखील सात तासात पोहोचले. एकतर पुण्याच्या पुढचा रस्ता चौपदरी आणि अत्यंत सुंदर आहे; आणि मला कुठेही फार वाहतूक जाणवली नाही. बेळगावात पोहोचले आणि खोली ताब्यात घेऊन मस्त ताणून दिली. संध्याकाळी उठून थोडी चालून आले आणि त्याचवेळी एका उडपी हॉटेलमध्ये मस्त डोसा, इडली आणि तिथली खास बनवलेली कॉफी घेतली. सकाळी सहा पर्यंत निघण्याचा विचार होता. मात्र घरमालकांनी मला सांगितलं की इथून तुम्ही फार तर चार तासात हंपीला पोहोचाल. का घाई करता. आठ पर्यंत निघालात तरी अगदी वेळेत पोहोचाल. तसही हंपी सोबतच तुम्ही पहिल्यांदा जिथे उतरणार आहात त्या सानापूरला देखील निसर्ग सुंदर आहे. मालकांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी काहीशी आरामातच निघाले. पोहोचण्याची घाई नव्हती. त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग पाहात अगदी निवांतपणे गाडी चालवत होते. प्रशस्त रस्ते आणि अजिबात नसलेली वाहातुक यामुळे गाडी चालवणे म्हणजे सुख वाटत होतं.

आजूबाजूच्या निसर्गात मी इतकी अडकत गेले की काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की गुगुल बाईने मला जो रस्ता सांगितला आहे तो गावांमधून जातो आहे.... म्हणजे नक्की मी रस्ता चुकले आहे. कारण बेळगाव सोडताना मला घरमालक म्हणाले होते; सुंदर हमरस्ता आहे. तुम्हाला कुठेही काहीही अडचण येणार नाही. लहान-लहान गावं लागायला लागल्यावर मी थोडी गडबडले आणि एक दोन ठिकाणी गाडी थांबवून रस्ता विचारला. प्रत्येकजण सरळ पुढे जाण्याबद्दल सांगत होतं. त्यामुळे रस्ता चुकले नसून कोणतं तरी वेगळं वळण घेतलं गेल्याचं माझ्या लक्षात आलं. 'जोपर्यंत अंधार होत नाही आणि गाडीमधलं पेट्रोल लाल कात्यापर्यंत येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते'; हे माझ्या भावाचं तत्व मनात ठेऊन पुढे जात होते. मनात भिती नसल्याने उलट आजूबाजूला लागणारी शेतं आणि पवनचक्क्या पाहात आणि या अफाट पसरलेल्या निसर्गाचा मनमुराद अनुभव घेत मी पुढे जात होते. साधारण एकच्या सुमारास मला सानापूर पंधरा मिनिटांवर दिसायला लागलं आणि मी जिथे माझी खोली राखून ठेवली होती तिथे फोन केला. ज्याने फोन उचलला त्याने लगेच मला लोकेशन पाठवलं आणि मग मात्र त्या लोकेशनच्या अनुषंगाने गाडी हाकत मी निघाले. आता आजूबाजूची हिरवाई संपून मोठे मोठे दगड दिसायला लागले होते. पण खरं सांगू.... त्या उंच अजस्त्र दगडांमध्ये देखील एक वेगळंच सौंदर्य होतं. डिसेंबर महिना असल्याने फार उकडत नव्हतं. मग गाडीच्या काचा खाली करत दर पाच मिनिटांनी थांबून फोटो काढत मी पुढे सरकत होते.

चुकलेल्या रस्त्यावरील दगडांचे वैभव.

दूरवर पसरलेली हिरवाई.

नक्की कोणता रस्ता घेऊ हा प्रश्न पडला होता मला

चारिकडे पसरलेला निसर्ग.

हरवलेल्या रस्त्यावर सापडलेली पवनचक्की.

वळणावरचे झाड वाकडे

डोळ्यांना सुखावणारी शेतं आणि त्यात विहारणारे स्वच्छंद पक्षी.

सानापूर जवळ आलं आणि मी परत एकदा त्याच मुलाला फोन लावला.
"Madam, keep driving and come straight. I Am standing on the road." त्याने मला म्हंटलं आणि त्याच्याशी हे बोलेपर्यंत मला तो दिसला देखील. एक पोरगेलासा लाल टीशर्ट घातलेला काळा पण हसऱ्या चेहेऱ्याचा तरुण होता. गाडीतून हात बाहेर करून मी त्याचं लक्ष वेधलं आणि त्याने खूण केल्याप्रमाणे गाडी आत वळवली.

मी गाडीतून उतरले आणि................. माझ्या समोर स्वर्ग होता जणू!!! समोर पाच सुंदर झोपड्या होत्या. मध्ये थोडं अंतर ठेऊन एक मोठा आणि खुला हॉल होता. जिथे खाण्यासाठी बसण्याची सोय होती. संपूर्ण बांधकाम बांबू आणि नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांनी केलेलं होतं. पण त्यात जे सौंदर्य होतं ते तुम्हाला कोणत्याही पंच तारांकित हॉटेलमध्ये दिसणार नाही. आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांच्या खळगीतलं सानापूर हे अगदीच लहानसं आणि गोंडस गाव. त्यात हे असं गावातल्या घरात राहिल्यासारखा अनुभव. अजून काय हवं हो?

फक्त पाच खोल्या (झोपड्या) आलेलं हॉटेल!

निसर्गाच्या सानिध्यातला होम स्टे.

स्वच्छ नीटनेटकी आणि आवश्यक सुविधा असलेली खोली.

रेस्टॉरंट!!

अत्यंत नेटकी, स्वच्छ आणि आवश्यक एवढी प्रशस्त खोली आणि अत्यंत स्वच्छ आणि गरजेच्या सगळ्या सोयी असणारं स्नानगृह. अजून काय हवं असतं? प्रवासाने काहीशी दमले होते आणि भूक देखील लागली होती. पटकन फ्रेश होऊन बाहेर आले आणि समोरच्या हॉलमध्ये गेले. सुंदर बैठकी केलेल्या होत्या. एका टेबलावर साधारण आठजण सहज बसू शकतील अशी दहा-बारा टेबलं होती. बसायला साध्याशा गाद्या. एका टेबलाजवळ बसत मी चौकशी केली काय मिळेल खायला? मला वाटलं होतं साधंसं गाव आणि त्यात हे असलं साधं राहण्याची सोय असलेलं ठिकाण; म्हणजे टिपिकल काहीतरी चायनीज आणि पंजाबी जेवणाचे प्रकार असतील. मनाची तशी तयारी देखील मी केली होती. पण आश्चर्य म्हणजे तिथे सगळं काही मिळत होतं. अगदी कॉन्टिनेनटल पासून ते पिझा-पास्ता... सिझलर्स, पंजाबी आणि डाएट फूड देखील. मेन्यूकार्ड बघून जितकं आश्चर्य वाटलं तितकीच मजा देखील वाटली.

जेवताना थोडी माहिती घेत होते आजूबाजूला काही प्रेक्षणीय आहे का. त्यावेळच्या गप्पांमध्ये कळलं की हा 'होम स्टे' तीन तरुणांनी मिळून सुरू केला आहे. हंपी मधील हिप्पी आयलंड खूपच प्रसिद्ध होतं.... अनेक कारणांनी. परंतु कर्नाटक सरकारने ते बंद करून टाकलं.... त्याच त्या 'अनेक कारणां'साठी. ही मुलं तिथे काम करायची. अचानक हातातलं काम गेलं आणि त्याचवेळी करोना माहामारी सुरू झाली. पुढचं भविष्य एकदम अंधःकारमय वाटायला लागलं. त्यातल्या एकाची ही थोडीफार जमीन होती. तिघांनी हिम्मत करून आजवर जमवलेले आणि थोडे उसने पैसे घेत हे 'होम स्टे' स्वतःच्या हातानी बनवलं. नुकतीच सुरवात केली होती त्यांनी. त्यांच्या हिमतीच मला खरंच खूप कौतुक वाटलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलं अजिबात शाळेत गेली नव्हती; आणि तरीही भारतीय भाषांसोबत फक्त इंग्रजीच नाही तर फ्रेंच, इटालियन आणि अशा अनेक भाषा असख्लीत बोलत होती. 'हिप्पी आयलंड' की देन है! म्हणाले.

सकाळपासून गाडी चालवून तशी दमले होते. त्यामुळे थोडावेळ आराम करायचा ठरवलं. उद्यापासून हंपी बघायला सुरवात करणार होते. पण आजचा दिवस तसा मोकळा होता. बेळगावच्या घरमालकांनी सांगितलेलं आठवत होतं. त्यामुळे माझ्या खोलीकडे जायच्या अगोदर त्या मुलांकडून माहिती घेतली की या सुंदर पण इटुकल्या गावात काही बघण्यासारखं आहे का? त्यांनी सांगितलेलं समजून घेतलं आणि आराम करायला खोलीत गेले.

दोन तासांनी गाडी घेऊन मी निघाले. 'होम स्टे' च्या पुढे गावातून अगदी पाच मिनिटं पुढे गेले आणि एक उजवीकडचं वळण घेतलं. थोडेसे उतार-चढाव आणि लहानसा रस्ता कापत पुढे गेले. एक लहानसं वळण पार केलं आणि माझ्या समोर निसर्गाचा एक अप्रतिम तुकडा पसरला होता. एका नदीचं पात्र... मस्त मोठंसं समोर होतं. आत दूर दोन टोपलीच्या होड्या होत्या. असेच एकटे दुकटे प्रवासी त्या होड्यांमधून नदीमध्ये फिरत होते. एक अजून होडी दिसत होती किनाऱ्यावर. मला गाडीतून उतरताना बघून होडीचा मालक आला विचारायला. पण उतरत्या संध्याकाळी वाहत्या वाऱ्यावर किनाऱ्याजवळ बसून राहावंसं वाटत होतं. आत्ता नको म्हणून त्याला नकार देऊन मी तशीच बसले किनाऱ्यावर. क्षणभर मनात आलं छानशी गाणी लावावीत... पण मग स्वतःला थांबवलं. निसर्ग भरभरून गप्पा मारत होता.... त्याच्या गप्पा ऐकण्यात जास्त सुख होतं.

अंधार व्हायला लागला आणि मी परत फिरले. परत माझ्या 'होम स्टे' वर आले आणि छानसं साधं खाणं मागवलं. दुपारी माझ्याशी गप्पा मारणारा मुलगा आला आणि म्हणाला;"मॅडम, आपको बिअर मंगता तो है। और भी कूच भी मिलेगा।" त्याचं बोलणं ऐकून हसले आणि म्हणाले तुझ्या या छानशा गावाच्या निसर्गाची नशा मला पुरेशी आहे... त्याहून जास्त नशा नाही लागणार मला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. काहीच नाही घेणार मी हे समजल्यावर. हसत सलाम ठोकत म्हणाला;"मॅडम, आप पहिला है जो कूच भी नही चाहीये बोला। नहीतो इधर आते ही पहिला वोही पुच्छते है।" मी हसले आणि जेवण आटोपून झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी सानापूरचा निसर्ग अजून जवळून पाहावा म्हणून निघाले. कालच्या ज्या वळणावर उजवीकडे वळले होते त्याच वळणावर डावीकडे वळण घेतलं आणि परत एकदा तीच ती नदी समोर होती. थोडं खडकांवर बसले... थोडी इथे तिथे फिरले आणि परत एकदा तीच ती टोपलीची होडी दिसली. मग होडीवाल्याला हात करून त्याच्या होडीत बसले. होडीत त्याच्याशी गप्पा मारायला लागले; तो म्हणाला या करोनाने आमचं कंबरडचं मोडून टाकलं आहे. आमच्याकडे एकपण पेशंट नाही. पण तरीही करोना मात्र आहे. आमचा मूळ व्यवसाय इथे येणाऱ्या देशी-परदेशी लोकांना फिरवणं हाच आहे. पण यावर्षी कोणीही आलं नाही. त्यामुळे खूप त्रास आहे. अशाच गप्पा होत होत्या आणि त्यांनी संगीतलं इथे एक पाचशे वर्ष जुनं माकडाचं मंदिर आहे. मी म्हंटलं अरे मारुती मंदिर म्हणायचं आहे न तुला. तर तो म्हणाला नाही... माकड मंदिरच आहे ते. बरंच उंच आहे. सातशे पायऱ्या असतील. इथे येणारे लोक तिथे नक्की जातात. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कसं जाता येईल याची चौकशी करायला लागले तर म्हणाला तिथे सध्या बिबट्या फिरतो आहे. त्यामुळे बंद केलं आहे मंदिर. 'बिबट्या फिरतो आहे'; ही माहिती त्याने इतक्या सहज दिली जणूकाही बरेच कुत्रे आहेत... म्हणून जाऊ नका असं म्हणतो आहे.
त्याच्या माहितीला गावातल्या इतरांकडून देखील दुजोरा मिळाला म्हणून मग इच्छेविरुद्ध मी मंदिर बघण्याचा कार्यक्रम रद्द केला; आणि तो दिवस सानापूरच्या निसर्गात मनमुराद भटकण्यात घालवला.

सानापूर मधील निसर्गरम्य नदी किनारा.

टोपलीची बोट.

बोटीतील अनुभव.

सानापूर मधील शेतं.

तिसऱ्या दिवशी मी हंपीला जायला निघाले. खरंतर मी हंपीमध्ये एक उत्तम पंच तारांकित हॉटेल ठरवलं होतं. पण माझ्या सानापूरच्या भटकंतीमध्ये मला कळलं की सानापूर ते हंपी जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर आहे. मग हंपीमध्ये राहण्याचा विचार बदलून मी सानापूर ते हंपी प्रवास करायचा ठरवलं. गुगलच्या मदतीने एक रजिस्टर्ड गाईड शोधून त्याच्याशी बोलणं केलं आणि हंपीच्या पहिल्या वळणावर भेटायचं ठरवून माझ्या स्वप्नांच्या दिशेने निघाले.....

 त्या कॉरॅकल्सचे वर्णन कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरला भेट दिलेल्या पोर्तुगीज प्रवासी दुमिंगो पाईशच्या वृत्तांतात देखील आले आहे.

पाईश म्हणतो-

टोकऱ्यांसारख्या गोल आकाराच्या नावांतून नदी ओलांडून लोक या शहरात येतात. या नावा आतून वेताच्या व बाहेरून चामडे मढवलेल्या असतात. पंधरा वीस माणसांची वाहतूक त्या एका वेळेला करू शकतात. गरज भासल्यास त्यातून घोडे आणि बैलही नेता येतात. पण बहुतेकदा हे प्राणी पोहत पलीकडे जातात. विशिष्ट वल्ह्यांनी या नावा वलव्हल्या जातात. इतर नावांप्रमाणे या गोलाकार नावा सरळ नाहीत तर वर्तुळाकार फिरत जातात, या राज्यात जेथे जेथे नदी ओलांडावी लागते तेथे याच नावा वापरल्या जातात, दुसऱ्या प्रकारच्या नावा येथे नाहीत.

 

 हंपी तुंगभद्रा नदी किनारी वसलेलं एक गाव आहे. खरं सांगू.... हंपीचा उल्लेख गाव म्हणून करताना माझं मन तुटतं आहे. चाळीस ते पन्नास किलोमीटर परिसरात उभे असलेले महाल, मोठमोठी मंदिरे, स्थापत्याचा अद्भुत नमुना म्हणावा अशा दगडी कमानी, स्नानकुंडे, जिकडे नजर फिरवाल तिथे असंख्य टेकड्यांमधून दिसणारे छोटे छोटे मंडप, मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या एक मजली-दुमजली बाजारपेठा.... इतकं समृद्ध स्थापत्य असलेला भाग हा गाव कसं असेल? पण आपलं दुर्दैव की आता हे फक्त भग्नावस्थेतले ऐतिहासिक स्त्यापत्य सौंदर्य आहे. मात्र प्रत्येकवेळी मनात एकच विचार येतो.... हा आपल्या भारतवर्षातील सुवर्णकाळाचा भव्यदिव्य साक्षात्कार आहे.

इ. स. 1336 ते 1565 मधील विजयनगर म्हणजे बलाढ्य हिंदू साम्राज्य जे महाराज कृष्णदेवराय यांनी सुवर्ण कळसाला पोहोचवलं. मात्र हंपीचा इतिहास हा त्याहूनही मागचा आहे. अगदी त्रेतायुगातील रामायण काळातला. इथे मला एक थोडा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा आहे.

माझा विश्वास आहे की आपण श्री भागवत रामायण ज्याला पौराणिक कथा मानतो आणि त्यामध्ये वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वांना देव किंवा दानव या दोन श्रेणींमध्ये विभागतो ते चूक आहे. रामायण काही पौराणिक कथा नाही.... तो आपला गौरवशाली इतिहास आहे. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे या सत्याला दुजोरा देणारी. अगदी अलीकडंच उदाहरणच सांगायचं तर श्रीराम जन्मभूमी येथील श्रीरामजन्म स्थळ हे खरेच असल्याचे पुरावे आदरणीय कोर्टाने देखील मान्य केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि भारत यामधील रामायण काळात बांधल्या गेलेल्या पुलाचे काही भग्न अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे..... हंपीचा इतिहास हा कृष्णदेवराय यांच्याहूनही मागील काळातला म्हणजे अगदी रामायण काळातला आहे.... हे सत्य आहे.

रामायणातील उल्लेखा प्रमाणे वानरराज सुग्रीव यांची नगरी होती किष्किंधा. जी तुंगभद्रा (त्रेतायुगात या नदीचे नाव पंपा नदी होते) नदीच्या जवळ वसलेली होती. रामायण काळातील ऋष्यमूक पर्वताचा उल्लेख श्रीराम आणि लक्ष्मणाने राहण्यासाठी वापरलेला पर्वत असा आहे. तो पर्वत देखील किष्किंधे जवळ असल्याचा आहे आणि विजयनगर साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक पर्वत होता ज्याचा उल्लेख ऋष्यमूक म्हणूनच केलेला लिखित स्वरूपात आढळतो. त्रेता युगातील पंपा नगरी म्हणून ओळखली ही नगरी पुढे आपभ्रंशीत होऊन हंपी म्हणून ओळखली जायला लागली; अशी देखील मान्यता आहे. तर असं हे आजचं हंपी गाव आणि आपल्या सुवर्ण काळातील एक सर्वांग श्रीमंत शहर पाहण्यासाठी मी निघाले होते.

आपण सुरवात वरती उल्लेख केलेल्या विरुपाक्ष मंदिरापासूनच करूया.

विरुपाक्ष मंदिर हे श्रीमहादेवाचे मंदिर आहे. येथील रहिवासी विरुपाक्ष महादेवांना पांपापति या नावाने देखील उल्लेखताट. या देवालयाच्या स्थापत्य सौंदर्याबद्दल वर्णन करायला मला शब्द कमी पडतील आणि तुम्हाला कधी गेलात तर बघायला वेळ कमी पडेल... इतकं हे देवालय अप्रतिम सुंदर आणि अत्यंत कल्पकतेने वातावरणातील नैसर्गिक बदल आणि त्याचा होणारा स्त्यापत्यावरील परिणाम याचा विचार करून बनवलेले आहे. विरपाक्ष मंदिराच्या दरवाजावरील नक्षीकाम अजोड आहे. आजच्या काळातील कलाकारांचा पूर्ण मान राखत मी म्हणेन की अनेकविध आयुधं उपलब्ध असूनही त्यांना इतकं सुंदर नक्षीकाम जमणार नाही. मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आज जरी ती भग्नावस्थेत असली तरी ते स्थापत्य कृष्णदेवराय महाराजांच्या काळातील वैभव आजही मिरवताना दिसते.

माझ्या गाईडने मला सांगितले की हंपीच्या इतिहासामध्ये या मंदिराचा वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धाराचा उल्लेख आहे. मात्र हे मंदिर नक्की कधी आणि कोणी बांधले याचा ठोस पुरावा नाही. एक अत्यंत महत्वाची बाब ही की भारतावर अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणामध्ये हिंदू मंदिरांचे अतोनात नुकसान करण्यात आले. भग्न मूर्ती, अत्यंत विचारपुर्वक बांधलेले स्थापत्य लयाला गेले. मात्र विरुपाक्ष मंदिराला कधीच हात लागला नाही. त्यामुळे येथील लोकांमध्ये एक मान्यता ही देखील आहे की आपल्या ऐतिहासिक रामायण काळात या जागेवर एक मंदिर उभे राहावे यासाठी काही यज्ञ किंवा बंधन निर्माण केले गेले असेल. मला माझ्या गाईडने अजून एक कारण सांगितले... अर्थात हे कारण स्वीकारणे प्रत्येकाच्या मानसिकतेवर आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे; मुसलमान मूर्ती पूजेच्या विरोधात आहेत आणि विरुपाक्ष मंदिरात शिव पिंडी आहे... मूलतः हिंदू देव हे मानवीय शरीराप्रमाणे असल्याने इतर मंदिरे भग्न पावली. पण शिवाला मानवीय रूप नसल्याने हे मंदिर वाचले. आठव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत हे मुख्य विजयनगरचे केंद्रस्थान होते. राज्याचा विध्वंस झाला पण हे मंदिर तसेच राहिले. हे पंपातिर्थ स्वामीस्थल म्हणून देखील ओळखतात. पूर्वेकडील गोपुर एकशे पाच फूट म्हणजे जवळ जवळ दहा मजले उंच आहे. मध्ये मोठे प्रांगण असून त्यात अनेक गोपुरे आहेत. संपूर्ण मंदिराभोवती राम, कृष्ण, विष्णू, शिव या अवतारांच्या कथा शिल्प स्वरूपात कोरलेल्या आहेत. प्रत्येक कथा परिपूर्ण आहे. या शिल्प कथा बघताना मला असं वाटलं की राम, कृष्ण, विष्णू आणि शिव यांच्या आयुष्यातील विविध प्राण्यांसंदर्भातील कथा या विशेष करून इथे शिल्पित केल्या आहेत. (अर्थात हे माझं मत झालं.) मंदिराच्या बाजूने खळखळा वाहणारी तुंगभद्रा नदी आहे आणि नदीकडे उतरणारे अनेक घाट देखील आहेत. या ह नदीचे पाणी दगडी पन्हाळींमधून मंदिराच्या प्रांगणात खेळवले आहे आई वरून या पन्हाळीं दगडांनी बंदिस्त केलेल्या आहेत. स्वच्छ आणि शुद्ध पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक अशी उत्तम सोय आहे इथे. मंदिर अति प्राचीन आहे यात शंकाच नाही. मात्र कृष्णदेवरायाने आपल्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ या देवळाचा रंगमंडप बनवला आहे.

विरुपाक्ष मंदिरासंदर्भात अजून एक कथा प्रचलित आहे. दक्ष यज्ञामधील सती देवींच्या दहना नंतर भगवान शंकर कैलास सोडून हेमकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन राहिले. तिथे पंपा देवी (पार्वती) भगवान शंकराची प्रेमभावनेने सेवा करीत होती. मात्र उग्र तापश्चर्येत मग्न श्रीशंकरांचे मन विचलित होत नव्हते. त्याचवेळी राक्षसांच्या सततच्या आक्रमाणांमुळे इंद्रादि देव त्रस्त झाले होते. त्यावेळी ब्राम्हदेवांनी दूरदृष्टीने जाणले की राक्षसांचा संहार केवळ शिवकुमारच करू शकतो. मात्र तपस्येत लीन श्रीशंकरांना जागे करणे अशक्य होते. त्यामुळे मन्मथाला पाचारण करण्यात आले. पंपादेवी श्रीशंकरची पूजा करण्यास नेहेमीप्रमाणे आली असता मन्मथाने पुष्पतीर सोडून श्रीशंकरांची तपस्या भंग केली. क्रोधीत श्रीशंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मन्मथाला भस्म केले. मात्र त्यानंतर त्यांचे लक्ष देवी पंपा (पार्वती) कडे गेले आणि यथावकाश शिवकुमार (कुमार स्वामी) यांचा जन्म झाला आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. मात्र मन्मथ पत्नी मन्मथाच्या मृत्यूने शोकाकुल झाली आणि जीव देण्यास निघाली. त्यावेळी तिला पंपादेवींनी थांबवले आणि श्रीशंकरांना संकडे घातले. त्यावेळी श्रीशंकरांनी मन्मथाला उ:शाप दिला. मात्र त्याला त्यानंतरचे जीवन बिना रूपाचे व्यतीत करावे लागले. बिनारूपाचा उ:शाप दिल्याने श्रीशंकरांना विरुपाक्ष हे नामाभिधान पडले आणि त्याचवेळी पंपादेवींचे पति म्हणून पंपापती देखील म्हंटले जाते.

















विरुपाक्ष मंदिर बघून मी पुढे निघाले. कोदंडधारी रामाचे मंदिर देखील असेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी असल्याचे मी वाचले होते. त्यामुळे ते बघण्याची मला खूप उत्सुकता होती. (थोडं विषयांतर होईल खरं पण... 'कोदंडधारी राम' हा उल्लेख झाला आणि पु. ल. देशपांडेंची सहकुटुंब सहपरिवार पार्ले भेट आठवते नाही.) त्यावेळी तुंगभद्रा नदीच्या तिरावरून लहान-मोठे चढ उतार पार करून पुढे जात होते. शेजारून वाहणारी भद्रा नदी मला प्रेमाने खुणावत होती. 'मंदिर बघशीलच ग.... थोडं माझ्याजवळ येऊन बस् तरी.' असं तर सुचवत नव्हती न ती? शेवटी मोह न आवरून तिचं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारत मी तिच्याशी हितगुज करत बसले होते. तो शांत परिसर आणि तिचं ते खळाळत वाहाणं... निसर्गाच्या ओंजळीत हरवल्यासारखं वाटत होतं मला. बराचवेळ असंच रमल्या नंतर रामदर्शन घेण्यासाठी मी निघाले. अप्रतिम सुंदर राम, लक्ष्मण आणि सीतेची काळ्या दगडातील किमान दहा फुटी मूर्ती मन प्रसन्न करत होत्या. रामाच्या हातातील कोदंड (धनुष्य) सुंदर बांक असलेलं होतं. पूजा करणाऱ्या गुरुजींशी सहज गप्पा मारायला लागले आणि आश्चर्य म्हणजे मी महाराष्ट्रातुन आले आहे आणि मराठी आहे हे कळल्यावर ते उत्तम मराठी बोलायला लागले. अनेक वर्ष मुंबईमध्ये ते नोकरी करत होते. पण मूळचे हंपी सारख्या निसर्गरम्य ठिकाणचे असल्याने त्यांचे मन मुंबईमध्ये रमले नाही आणि काही वर्षातच परत हंपीमध्ये येऊन ते पूर्वापार चालत आलेल्या कोदंडधारी रामाच्या सेवेत रुजू झाले; असे म्हणाले.
१०

कोदंडधारी राममंदिर बघून पुढे निघाले ते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी. कदाचित माझा हा लेख वाचायला सुरवात करतानाच तुम्ही या मंदिराचे वर्णन अपेक्षित केले असेल. कारण हंपी म्हंटलं की कोणार्कच्या सुर्यमंदिराच्या धर्तीवर भव्य कोरीवकाम केलेल्या जगप्रसिद्ध दगडी रथाचे फोटो आणि वर्णन सर्वात प्रथम अपेक्षित असते. विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजा कृष्णदेवरयांनी स्वतःच्या दिग्विजया प्रित्यर्थ हे मंदिर बनवले आहे. असंख्य कोनांनी नटवलेला मुख्य चौथरा हा अजस्त्र कोरीव शिलांनी बनवलेला आहे. आता या चौथऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मात्र माझ्या गाईडने दिलेल्या माहिती प्रमाणे या चौथऱ्यावरील जे स्तंभ आहेत ते अत्यंत मजबूत आणि दगडांचे असले तरी त्यातून ह्रिदम निर्माण होते. म्हणजे जर एका ठराविक पद्धतीने या खांबांवरून आपण बोटं फिरवली तर नाद निर्माण होतो. पूर्वी मंदिरामध्ये ज्यावेळी मोठे मोठे समारंभ, विवाह, उत्सव होत असत त्यावेळी या स्तंभांचा उपयोग वाद्य म्हणून केला जाई. या स्तंभांवर प्राणी, पक्षी यांचे कोरीव काम आहे. तर मंदिराच्या भिंतींवर विविध देवतांची शिल्पे आहेत. मंदिरासमोरील जगप्रसिद्ध दगडी रथ म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवणारे वास्तुशिल्प आहे. अनेक दगडीणी रचनात्मक रीतीने साधलेला आणि अप्रतिम कोरीव नक्षकाम केलेला, दगडी चाके असणारा आणि पुढील बाजूस दोन दगडी हत्ती असणारा हा रथ एकेकाळी चालवत असत. या रथाच्या मध्यभागी दगडी सोपान आहे आणि चाकांमध्ये आरीचा दांडा आहे. या रथाचे विशेष म्हणजे रथावरील सैनिकांचे शिल्प आहेत त्याचे चेहेरे अरब, पर्शियन किंवा पौर्तुगीज लोकांशी मिळते-जुळते आहेत.

माझ्या गाईडने सांगितले की तुम्ही जर प्रत्येक मंदिर किंवा राजाच्या राजवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे स्थापत्य बघितलेत तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे विविध चेहेरे दिसतील. त्याच्या म्हणण्यानुसार विजयनगर भारतवर्षातील सर्वात श्रीमंत शहर होते. राजा कृष्णदेवराय अत्यंत कलासक्त आणि आगत्यशील होता. त्यामुळे दूरदूर देशातील (किंबहुना असं म्हणू की सर्वदूर पसरलेल्या भारतवर्षातील) लोक आपल्या वस्तू, कला-कौशल्य घेऊन राजाश्रयाच्या आशेने इथे येत असत; आणि त्यांची ही आशा राजा कृष्णदेवराय पूर्ण करत असे.

कदाचित असं देखील असेल की महाराज कृष्णदेवराय यांच्या कलाप्रेमाविषयी समजल्यानंतर अनेक कलाप्रेमी विद्यार्थी शिल्पकला शिकण्यासाठी विजयनगरीमध्ये दाखल झाले असतील; आणि शिक्षणादरम्यान शिल्पकलेतील कथा तर रामायण, महाभारतातील घेतल्या असतील आणि स्वतःची ओळख सांगण्यासाठी (special signature establishment) चेहेरे मात्र आपल्या देशातील जडणघडणी प्रमाणे निर्माण केले असतील.

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१
हंपी मधील हमखास बघावे अशी एक खास गणपतीची मूर्ती आहे. कडलेकलू या नावाने ओळखली जाणारी ही गणेश मूर्ती एका उंच गर्भगृहात स्थापित असुन ती अखंड कातळात कोरलेली आहे. गर्भागृहासमोर रंगमंडप असून तो उंच स्थभांनी तोललेला आहे.

२२

२३

पुढील शिल्प म्हणजे बडवी शिवलिंग. अखंड काळ्या पाषाणात कोरलेले एक भव्य शिवलिंग आहे हे. याचे गर्भगृह अत्यंत साधे असून याला वर छत देखील नाही. शिवलिंगाचा तळ सतत पाण्यात असतो.

२४

२५

लक्ष्मी नरसिंव्ह ही 6.7 मित्र उंच सर्वात भव्य मूर्ती असावी हंपीमधील. या मूर्तीची निर्मिती एका ब्राम्हणाद्वारे केली गेली असे मानले जाते. मात्र आर्य कृष्णभट्ट यांच्या शुभहस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असे मानले जाते. या मूर्तीचे विशेष म्हणजे नरसिंव्ह मूर्ती असूनही त्यांच्या उजव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असल्याचे शिल्प होते. मात्र ही लक्ष्मी मूर्ती खंडित झाली आहे. आता केवळ लक्ष्मीचा डावा हात उरला आहे जो अत्यंत मनोहरपणे भगवान नरसिंव्हांच्या कमरेला धरलेला आहे.

२६

२७

यापुढच्या हंपी वर्णनाच्या अगोदर थोडा श्वास घेऊया का? मला माहीत आहे; तुम्हाला वाटतंय की ज्याप्रमाणे मी एकामागून एक वर्णन करत सुटले आहे त्यावरून संपूर्ण हंपी मी एका दमात आणि एका दिवसात बघितलं आहे. पण तसं नाही हं. निसर्गात आणि अप्रतिम शिल्पकला आणि स्त्यापत्य कला यात रमत मी एकूण पाच दिवस फिरले हंपीमध्ये. तसं तीन दिवस पुरेसे असतात. पण मला सगळंच मनापासून बघायचं आणि त्याहूनही जास्त अनुभवायचं होतं. त्यामुळे मी मुद्दाम दोन दिवस जास्त राहिले. अर्थात प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे दिवस ठरवावेत असं मला वाटतं. या हंपी वर्णनातला एक खास वेगळा अनुभव आहे. पण तो वर्णन करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात तर जास्त मजा येईल.

महानवमी डिब्बा ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे. हिचा आकार चौकोनी असून तळ प्रचंड मोठा असून हळूहळू तो लहान होत जातो. राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ ही वेदी उभारली गेली होती. या वेदीच्या चारही बाजुंनी शिल्पपट कोरलेले आहेत. यामध्ये स्त्रिया शिकार करताना, युद्धकला शिकत आहेत अशी शिल्प देखील आहेत. याचा अर्थ असा होतो की महाराज केवळ कलासक्त, हुशार, उत्तम स्त्यापत्यकार नव्हते; तर स्त्रीसन्मान कसा केला जावा आणि त्यासाठी स्त्रियांना देखील बरोबरीची वागणूक मिळावी हा विचार त्यांच्या राज्यात केला जात होता असे दिसते. या शिल्पांमध्ये होळीचे, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग शिल्पित केले आहे. एकेठिकाणी डोक्यावर पर्शियन टोपी घातलेली आणि लहान दाढी असलेली व्यक्ती शिल्पित आहे. या व्यक्तीला हत्ती नमस्कार करतो आहे असे शिल्पित आहे. कदाचित त्याकाळात महाराज कृष्णदेवराय यांना दूरदूरहुन इतर राजे देखील भेटायला येत असतील आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जात असेल. याच प्रसंगाला शिल्पित केले गेले असेल.

२८

२९

३०

३१

३२

स्थापत्य सौंदर्याने नटलेल्या हंपीमधील काळ्या दगडाची पुष्कर्णी अत्यंत खास आहे. अलीकडे लग्नाच्या अगोदर मुलगा-मुलगी विविध ठिकाणी जाऊन सुंदर फोटो काढतात. ज्याच्या-त्याच्या हौसे प्रमाणे आणि आर्थिक सोयीनुसार ही ठिकाणं ठरतात. या prewedding shoots मधील अगदी खास ठिकाण म्हणजे ही पुष्कर्णी. काळ्या पाषाणात बनवलेली पायऱ्या-पायऱ्यांची स्थापत्य रचना आहे हिची. अनेक वर्षे मातीच्या टेकडीखाली दबली गेलेली ही पुष्कर्णी अप्रतिम सुंदर आहे. पूर्व काळापासून एका दगडी पन्हाळीतून या पुष्कर्णी मध्ये पाणी खेळवले गेले आहे. माझा गाईड संगत होता की ही पुष्कर्णी शोधताना जे कामगार होते त्यात तो देखील होता... अर्थात त्यावेळी तो खूपच लहान होता. मात्र नाजूक ब्रश आणि जमिनीवर जवळ-जवळ सरपटत जाऊन एक एक भाग मोकळा करावा लगत असे. प्रत्येक फुट स्वच्छ केल्यानंतर तिथे असणाऱ्या वास्तू संशोधकांपैकी कोणाला तरी बोलावून झालेले काम दाखवावे लागायचे. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातील भाव सांगत होते की तो परत एकदा लहान होऊन सरपटत ती पुष्कर्णी शोधत होता.

या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक मंदिर आहे. या पुष्कर्णीची कथा अशी आहे की राज घराण्यातील स्त्रियांनी या पुष्कर्णीमध्ये पाय धुवून मगच या मंदिरातील देवीच्या दर्शनाला रोज जाणे अपेक्षित होते.

३३

३४

महानवमी डिब्बा, पुष्कर्णी यानंतर राज परिवारातील स्त्रियांसाठी बनवलेला कमल महाल ही देखील एक सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. लोटस महाल असा याचा उल्लेख अलीकडे केला जातो. या स्थापत्यामध्ये मुसलमानी शैलीचा काहीसा भास होतो. या तीन मजली इमारतीमध्ये जाण्यासाठी आतल्या बाजूस जिने आहेत. पण आता ते बंद करून टाकले आहेत. कड उन्हात देखील या महालात थंड हवा खेळती असते. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ही थंड हवा खेळती राहण्यासाठी हवेच्या दाबावर पाणी या महालाच्या सर्वात वरील टोकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे. हे पाणी वरून महालाच्या चोहीकडून कारंज्याप्रमाणे खाली येते. त्यामूळे भर उन्हाळ्यात देखील पाऊस पडत असल्याप्रमाणे हा महाल पाण्यात भिजत असतो. कौतुकास्पद स्थापत्य हे की खाली पडणारे पाणीचं नाल्यामधून एका बाजूस एकत्र करून परत वर चढवले जाते. खरंच मानत येतं त्या काळातील भारतीय स्थापत्यकार आजच्या मानाने कितीतरी पुढचा विचार करणारे होते.

३५

३६

क्रमशः


विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे. ऐंशी फूट लांब आणि किमान पस्तीस/चाळीस फूट रुंद असा हा तरण तलाव आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना बसण्याची सोय आहे. बहुतेक स्वतः महाराज कृष्णदेवराय देखील या तरण तलावात होणाऱ्या स्पर्धांना भेट देत असावेत. कारण या तरण तलावाच्या एका बाजूला दगडी घुमत असलेली मेघडंबरी आहे. एका नजरेत न मावणारा विस्तार आहे या तलावाचा.
१. तरण तलाव
1

२. तरण तलावाची माहाराज बसत असलेली बाजू.
2

३. तरण तलावाजवळील मेघडंबरी.
३

तरण तलावाच्या एका बाजूला पुष्कर्णी आहे आणि त्याच्या पुढेच माहाराजांच्या नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा येतो. (हे इतकं मोठं वाक्य लिहिताना या राजदरबारासाठी एक उल्लेख मनात आला. 'दीवणे-आम'. पण मग मनात आलं हा काही आपल्या शब्दकोशातील शब्द नाही. मग थोडं मोठं वाक्य होईल... पण नागरिकांसाठी भरणाऱ्या दरबाराचा उंचवटा.... असं म्हणणंच जास्त योग्य होईल! असो!) माझ्या गाईडने मला सांगितलं की महाराज कृष्णदेवराय ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी म्हणून खास दरबार भरवायचे. यावेळी माहाराज एका उच्चासनावार बसत असत. त्यामागे दोन कारणं होती... अर्थात पहिलं कारण माहाराजांची सुरक्षा हे होतं आणि दुसरं कारण ऐकून माझा कृष्णदेवराय माहाराजांबद्दलचा मनातील आदर खूपच वाढला. ते कारण म्हणजे.... या उच्चसनावरून माहाराजांना समजू शकत असे की नक्की किती लोक त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामूळे दारवान किंवा शिपाई किंवा कोणी अधिकारी जर कोणा नागरिकाला थांबवत असेल तर ते महाराजांना दिसत असे आणि ते असं होऊ देत नसत. किती वेगळा विचार करणारा राजा होता तो.... 'जेव्हा मी माझ्या रयतेचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी वेळ काढीन त्यावेळी सर्वांचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत मी तिथे उपस्थित राहीन.' कदाचित म्हणूनच अगदी नेपाळ-भूतान पर्यंत महाराज कृष्णदेवरायांनी युद्ध मजल मारली आणि त्यांच्या सोबत त्यांचं सैन्य कायम राहिलं.

४. महाराजांचे उच्चसन.
4

५. माहाराजांच्या नागरिकांना भेटण्यासाठी असलेल्या उच्चसनावरून दिसणारा संपूर्ण भाग. इथून होळी समारंभासाठी बांधलेला चौथरा देखील दिसतो आहे.
5

६.
6

पुढच्या एका अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद भुयाराबद्दल सांगण्या अगोदर एक खूपच महत्वाच्या स्थापत्य निर्माणाबद्दल सांगण आवश्यक आहे. त्याकाळातील स्थापत्य विशारदांचं कौतुक करू तितकं कमीच. किंबहुना मी तर म्हणेन की आपली लायकीच नाही त्या अत्यंत विचारी आणि समयोचित नियोजन करण्याचं सामर्थ्य असलेल्या लोकांचं कौतुक करण्याची. त्यांनी निर्माण केलेले स्थापत्य आपण बघावं आणि तोंडात बोट घालून गप बसावं इतकंच काय ते आपलं कर्तृत्व असू शकतं. तर...

महाराज कृष्णदेवराय यांचा राज परिवार सामावणारा परिसर अत्यंत मोठा आणि दूरवर पसरलेला आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. या अतिप्रचंड भागामध्ये राज परिवार आणि त्यासोबत त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सर्वांसाठी विविध सोयी तर केल्या तरी सर्वात महत्वाची आणि अत्यावश्यक सोय म्हणजे पाणी. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसराला योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे दगडी चर संपूर्ण परिसरात फिरवलेले आहेत. तरण तलावात पडणारे पाणी असो किंवा पुष्कर्णीमध्ये जाणारे पाणी असो... महाराजांच्या राज महालाचे आता फार अवशेष उरले नसले तरीही त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे कालवे अजूनही शाबूत आहेत. खरंच हे निर्माण करणं फारच अवघड आहे. या पाणीपुरवठयाचा विचार किती खोलवर केला असेल हे देखील समजून घेण्यात मजा आहे. माहाराजांच्या राजपरिवरासाठी निवडण्यात आलेल्या जागेच्या थोड्या दुरावरून नदी वाहाते. नदीच्या पात्राच्या उताराचा अभ्यास करून पाण्याच्या दबाव तंत्राचा वापर करून राजपरिवर जागेपासून काही अंतरावर दोन तलाव बांधण्यात आले आहेत. हे तलाव दगडाचे असले तरी यामध्ये नैसर्गिक झरे येऊन मिळतात. या तलावांपासून एक मोठा कालवा तयार करून तो राजपरिवार जागेपर्यंत आणण्यात आला आहे. संपूर्ण जागेवरून हा कालवा फिरवल्या नंतर त्याचा उतार एका अशा बाजूला निर्माण केला आहे की जिथे त्याकाळात राज परिवाराव्यतिरिक्तच्या लोकांसाठी अन्न शिजवलं जात असे. (माहाराज कृष्णदेवराय यांना भेटण्यासाठी अनेक राजे-माहाराज येत असत. त्यांच्या सोबत त्यांचा लावाजमा असे. त्यांच्यासाठी अन्न बनवले जात असे ती जागा). तिथून हा कालवा अजून पुढे देखील जातो आणि मग हळू हळू जमिनीला समांतर जात अजून एका मानव निर्मित तलावात त्याचे पाणी सोडलेले आढळते. जिथे तो कालवा जमिनीला समांतर जातो त्याच्या दोन्ही बाजुंनी दगडात कोरलेली जेवायची ताटं आहेत. काही केळीच्या पानांच्या आकाराची तर काही नुसती आयताकृती. वट्यांसाठीचे खड्डे देखील आहेत त्यात. या ताटांमधून देखील नादनिर्मिती होते.

७. दगडात कोरलेली नादमययी ताटे आणि वाट्या.
7

पुढचा विडिओ नक्की बघा हं. एका कृत्रिम तलावाखाली तयार केलेली खोली आहे. सहज बघितलं तर राज परिवारासाठी तयार केलेला पाण्याचा साठा. मात्र खाली एक महत्वाच्या व्यक्तींसोबत खलबतं करण्याची खोली. यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे वरती पाणी असल्याने खालील चर्चा इच्छा असूनही कोणालाही ऐकायला येणे शक्य नाही. (हा खलबतखाना बघताना मला शिवरायांची आठवण झाली. अनेक गड आणि किल्ले बघितले आहेत मी आजवर. त्यापैकीच कोणत्यशा गडावर शिवाजी माहाराजांनी देखील असाच काहीसा खलबतखाना तयार करून घेतला होता; तो बघितल्याचं आठवत मला. पण कोणता किल्ला आणि कधी बघितलं आहे ते मात्र आता आठवत नाही. अर्थात इथे एक इंग्रजी म्हण चपखल बसते असं वाटतं... All great people think alike.)

या चोर खोलीच्या पुढेच महाराज कृष्णदेवराय यांचा कला दरबार भरत असे. इथे एक मोठा चौथरा आहे. चार फूट उंच असा. याच्या चारही बाजूंनी बसता येईल अशी सोय असल्याचं दिसतं. चारही बाजूनी या चौथऱ्यावर चढता येतं. या जिन्यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती आहेत आणि या हत्तींच्या कानांना भोकं आहेत. त्याशिवाय चौथऱ्याच्या प्रत्येक कोणाकडे देखील भोक आहे. माझा गाईड सांगत होता की या चौथऱ्याच्या मध्यावर एक सुंदर रंगीत तलम कापडांनी सजवलेला प्रचंड उंच बांबू उभारला जायचा. त्या कापडांची दुसरी टोकं या हत्ती आणि इतर चार कोनांमधील भोकांमधून घालून एक सुंदर आणि वेगळी सजावट केली जात असे. या चौथऱ्यावर कला प्रदर्शन करण्यासाठी परदेशातून नामवंत कलाकार येत असत. त्याशिवाय महाराज कृष्णदेवराय यांच्या पदरी देखील अनेक अलौकिक नृत्यांगना होत्या. यांची कला देखील या चौथऱ्यावर प्रदर्शित होत असे. राजा कृष्णदेवराय यांचे वेगळेपण असे की ज्याप्रमाणे राज परिवारासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी असे कार्यक्रम आयोजित होत; त्याचप्रमाणे आम जनतेसाठी देखील असे कला प्रदर्शनाचे कार्यक्रम होत असत. त्यात देखील अजून एक वेगळी बाजू म्हणजे जर महाराजांच्या जनतेमधून आयत्यावेळी कोणी पुढे येऊन स्वतःची कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली तर माहाराज ही इच्छा देखील पूर्ण करत असत.

८.
8

चौथऱ्याच्या बाजूच्या भोकांचा विडिओ.

दंडनायकाचा बुरुज नावाचा एक बुरुज आहे कमल महालाजवळ. अशी वदंता आहे की कृष्णदेवराय माहाराज स्वारीवर जात असत त्यावेळी त्यांचा स्त्रीपरिवर या कमल महाल आणि परिसरात राहायला येत असे. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा दंडनायकाचा बुरुज बांधलेला होता. केवळ या बुरुजावर काही पुरुष पाहरेकरी ठेवले जात. बाक आतील बाजूस केवळ महिला पाहारेकरी आणि दासी असत.

९. दंडनायकाचा बुरुज.
9

कृष्णदेवराय माहाराजांची गजशाला खरच पाहण्यासारखी आहे. माहाराजांच्या प्रमुख अकरा हत्तींना राहण्यासाठी बनवलेली ही गजशाला अजूनही अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत आहे. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आतून लहान दरवाजे देखील आहेत. प्रत्येक दळणाला वर गोल घुमट आहे आणि घुमटाखाली लोखानदी हुक आहे. यांच्या आधारे दोरखंडांनी हत्तींना बांधून ठेवत असत. गजशालेच्या एका बाजूला अजून एक इमारत दिसते. ती देखील अजूनही उत्तम स्थितीत आहे. मात्र आता लोखंडी गेट्स बसवून ती बंद केली आहे. इथे पाहारेकरी आणि माहुतांचे वसतिस्थान असावे.

१०. सुस्थितीत असलेली गजशाला.
10

११. माहुतांचे निवासस्थान
11

१२. हत्तीच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना मध्ये लहान दरवाजे आहेत.
12

राजा कृष्णदेवराय यांच्या राज परिवारासाठी तयार केलेला परिसर वरील फोटोंमधून आपल्याला दिसलाच असेल. या हजारो एकरांवर पसरलेल्या महाराजांच्या राहण्याच्या जागेबरोबरच; विविध सण-समारंभ किंवा कला प्रदर्शनासाठी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या चोहोबाजूंनी एक कणखर तटबंदी होती. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. मात्र या तटबंदीच्या मधोमध एका अखंड शिळेतून बनवलेला दरवाजा मात्र अजूनही एका बाजूस ठेवलेला दिसतो. कदाचित फोटोमधून त्या अजस्त्र दरवाजाचा अंदाज पूर्ण येणार नाही. पण थोडी तरी कल्पना करू शकाल तुम्ही म्हणून हा फोटो देखील इथे देते आहे.

१३.
13

१४.
14

१५.
15

पुरातन काळातील स्थापत्य शैलीचं कौतुक करावं तितकं कमीच म्हणता येईल. महाराज कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राजकुळातील स्त्रियांसाठी विविध वैशिष्ट्यांनी सजवलेले स्नानगृह देखील निर्माण करवले होते. या स्नानगृहाला वरून गोपुराचा आकार दिला गेला आहे. मध्यभागी तलाव निर्माण करून त्यात दगडी पन्हाळीमधून पाणी सोडण्याची सोय केली आहे. कौतुकाचा भाग हा की या तलावातील वापरलेले पाणी वेगळ्या पन्हाळीमधून बाहेर काढून ते सभोवतालच्या बगीचाला पुरवले जाईल अशाप्रकारे सोय केली आहे. कितीतरी खोल विचार केला आहे हे स्नानगृह बांधताना. स्नानगृहातील तलावाच्या चारही बाजूनी व्हरांडा आहे आणि त्याला तलावाच्या बाजूने झरोके देखील केले आहेत. कोपऱ्यांमधून स्नानगृहाच्या वरील गच्ची सदृश भागात जाण्यासाठी जिने आहेत. परंतु ते आता बंद करून टाकले आहेत. माझ्या गाईडने सांगितले की लहानपणी इथे सर्व मुलं लपाछपी खेळण्यास येत असत. कधीतरी पुढे वास्तुशास्त्र तज्ञ आले आणि मग लहान मुलांसाठी खेळण्याची एक जागा बंद झाली.

१६.
16

१७.
17

१८.
18

हंपीमध्ये आलात आणि सूर्योदयाचं नयनमनोहर दृष्य बघितलं नाहीत असं नक्की करू नका. हजारराम मंदिराच्या जवळच लहानशी टेकटी आहे. तिथे थोडं चढून गेलं की दगडी कुटी आहे. कदाचित पूर्वकाळातील साधू-संतांच्या राहण्यासाठी आणि तपश्चर्येसाठी तयार केलेल्या त्या परिसरातील अनेक कुटींमधली ही कुटी असावी. तर अगदी अंधार असताना या कुटीच्याही वर चढून जाऊन बसावं लागतं. एक लांबलचक वाट बघण्याची वेळ... पण मग ते लवकर उठणं, ते धडपडत वरपर्यंत चढून जाणं आणि ते वाट बघणं खरंच फळतं.... केशररंग घेऊन सामोरा येणाऱ्या आदिनारायणाचं ते शुचिर्भूत दर्शन पुढचे अनेक दिवस मन प्रसन्न ठेवायला पुरेसं ठरतं.

१९.
19

२०.
20

दिनकराला वंदन करून खाली उतराल तर समोरच हजारराम मंदिर म्हणून ओळखलं जाणारं रामाचं मंदिर दिसतं. या मंदिराचं विशेष म्हणजे असं मानतात की रावणाने सितामातेचे हरण केल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण सितामातेला शोधायला निघाले त्यावेळी त्यांनी याठिकाणी काहीकाळ विश्रांती घेतली होती. मंदिराच्या आवारामध्ये एक प्रचंड मोठा सभामंडप आहे. या सभामंडपाचं विशेष म्हणजे या सभांमंडपामध्ये कोरलेली शिल्पे ही रामायण काळातील कथांवर आधारित असली तरी या शिल्पांचे चेहेरे प्रचंड भिन्न आहेत. काही चेहेरे हे नेपाळ-भूतान येथील लोकांसारखे आहेत; तर काहींचे चेहेरे लांबाकृती आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक कुटी असल्याचं मी म्हंटलंच आहे. मला वाटतं कदाचित या मंदिरामध्ये शिल्पकला शिकण्यासाठी येणारे दूरदेशीचे विद्यार्थी राहात असतील. आपल्या शिक्षकांनी शिकवलेली विद्या येथील सभामंडपातील खांबांवर ते कोरत असतील. मात्र आपल्या देशाची किंवा जेथून आलो तिथली ओळख या ठिकाणी राहावी या उद्देशाने कथा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कोरली तरी त्यातील चेहेरेपट्टी आपल्या देशाची निर्माण करत असतील.

२१. 21

२२.
22

कर्नाटकातलं हे हंपी म्हणजेच राजा कृष्णदेवराय यांचं विजयनगर किंवा रामायण काळातील किष्किंदा नगरी म्हणजे निसर्ग आणि पुरातन स्थापत्याने नटलेलं गाव/शहर. तुम्ही जितकं फिराल तितकं कमीच. आपापल्या आवडीनुसार किती दिवस जायचं ते प्रत्येकाने ठरवावं. माझ्याबद्दल सांगायचं तर सानापूर मधल्या home stay मध्ये काहीही न करता मी आठवडाभर राहूच शकते. रोज उठून नदीवर जायचं आणि खळाळत पाणी बघत राहायचं. जमलंच तर गावातल्या पोरांबरोबर मासे पकडायचे. दहा मिनिटात फिरून संपणाऱ्या गावात फिरायचं.... आणि मग पुरातन वारसा लाभलेलं जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारं हंपी बघायला निघायचं. अर्थात या संपूर्ण वर्णनामध्ये इथल्या कर्नाटकी जेवणाचा उल्लेख मी केला नाही... तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी न खाता-पिता फिरत होते. असं मुळीच नाही हं. इथले लोक खाण्याच्या बाबतीत प्रचंड हौशी आहेत. विरुपाक्ष मंदिराच्या जवळच एक अत्यंत स्वच्छ आणि सुंदर खानावळ आहे. तिथलं जेवण अप्रतिम आहे. एकदम कर्नाटकी पध्दतीचं. मी माझ्या गाईडला आग्रहपूर्वक सांगितलं होतं की मला रोज इथल्या सर्वसाधारण ढाब्यावर जाऊन जेवायचं आहे. दोन वेळा तर आम्ही एकशे पंचवीस रुपये प्रत्येकी भरून बुफेमध्ये जेवलो. भरपूर भात... मग तो एकदा सांबार बरोबर, एकदा रस्सम बरोबर, मग भाजी बरोबर आणि शेवटी दही-दुधाबरोबर खायचा असतो. गोड म्हणून इथे खीर देतात. इथली थंड पेय देखील अगदी खास... एक तर ताक; साधं किंवा मसाला घातलेलं. दुसरं पोटासाठी अत्यंत उत्तम असं पुदीना सरबत. इथले ढाबे अत्यंत स्वच्छ आणि भारतीय बैठकी असलेले आहेत. अर्थात ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल-खुर्ची अशी सोय देखील आहेच.

२३. विरुपाक्ष मंदिराजवळील ढाबा.
23

२४. मँगो ढाब्यामधील टेबल खुर्ची बैठक.
24

२५. मँगो ढाब्यामधील भारतीय बैठक
25

२६. कर्नाटकी शाकाहारी जेवण. विरुपाक्ष मंदिर जवळ असल्याने इथे मांसाहार वर्ज आहे. मात्र थाळी unlimited
26

२७. गावातील ढाबा भारतीय बैठक.
27

२८. थाळी.
28

हंपी बद्दल इथे मी जरी लिहिलं असलं तरी हंपी पाहणं हा एक खरंच अनुभव आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तो अनुभव एकट्याने घेण्यात खरी मजा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जरी थोडा जास्त वेळ थांबलात तरी चल-चल म्हणून कटकट करणारं कोणी नसतं. माझं मत विचाराल तर हंपीमधला निसर्ग फक्त डोळ्यात नाही तर मनात साठवून घ्या. इतक्या सहज नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसता येण्याचं सुख आता भारतात फारसं उरलं नाही. एकतर भडभुंजे मागे लागतात नाहीतर काही न काही विकायला येणारे लोक असतात. तुंगभद्रेचा किनारा अजूनही अशा दृष्टीकोनातून अस्पर्श आहे. इथे अजूनही शांतता आणि पक्षांची किलबिल आहे. एक अजून अनाहूत सल्ला. इथल्या नदीकिनारी बसताना कोणतंही गाणं नका हं लावू... मला देखील आशा-किशोर-लता-मन्ना डे आणि सगळेच जवळ घेऊन बसावंस वाटलं होतं पहिल्या दिवशी. पण मग लक्षात आलं की मी गाण्याच्या शब्दांमध्ये हरवते आहे.... समोर पसरलेल्या या प्राकृतात नाही.... आणि मग फक्त आणि फक्त हंपी जगायचं ठरवून फिरायला बाहेर पडले.


 आजवर संध्याकाळी हंपीमधे मुक्काम आमच्यापैकी कोणीही टाकला नव्हता. जयचे की नाही, जायचे की नाही असे करत शेवटी जायचे ठरविले. नुसतेच गेलो नाही तर के एस आर टी डी सीच्या सौजन्याने चांगले तीन दिवस राहिलो. हे हॉटेल हंपीमधेच आहे. (हॉस्पेटला रहाण्यात काही अर्थ नाही हे मी अनुभवाने सांगू शकतो) दोन दिवसांवर एक दिवस फुकट अशी सूटही मिळाल्यावर कोण नाही राहणार ? शिवाय भाड्यातही चांगली सूट मिळाली. अर्थात हे सगळे ऑफसिझन असल्यामुळे असे व्यवस्थापक सांगण्यास विसरला नाही. पण एकंदरीत सगळे कर्मचारी चांगलेच होते. जेवणही चांगले आणि मुख्य म्हणजे थंडगार बीअर मिळत होती. आख्या हॉटेलमधे फक्त आम्हीच असू. दुसर्‍या दिवशी एक गाडी आली व संध्याकाळी गेली.

आता यावेळी काढलेले काही फोटो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire
राणीवशाची भिंत व त्यामधे देखरेखीसाठी उभे केलेले मनोरे. लोटस महालावर गिलाव्यातील नक्षिकाम फार सुंदर आहे.

हा तो महाल...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हंपीमधी सगळ्यादूर हे दृष्य दिसते..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नृसिंहाची मूर्ती अंदाजे १५ फूट उंच असावी. त्याचाच एक क्लोजअप.

विरुपाक्ष मंदीराबाहेर विकायला ठेवलेला गजरा. मला दक्षिण भारतातील स्त्रियांच्या फुलांच्या वेडाचे फार कौतुक वाटते. कुठेही जायचे असल्यास केसात गजरा माळलेला असलाच पाहिजे... आणि गजरे असतातही स्वस्त आणि ताजे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विरुपाक्ष मंदीर.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विरुपाक्ष मंदीरात एक कामशिल्प आहे. जेथे मोठी घंटा बांधली आहे त्याला पाठ करुन समोर वर पाहिले की ते आपल्याला दिसेल. त्याचे छायाचित्र टाकून आजचा भाग संपवतो. पण वर दिलेल्या लिंक्स वाचण्यास विसरु नका...उद्या विठ्ठल मंदीर..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रमशः

 

गले दिन 10 मार्च 2016 को सुबह हमने कर्नाटक के नगर हम्पी जाने का फ़ैसला किया। विजयनगर साम्राज्य की राजधानी हम्पी जाने का कई वर्षों से मन था। आज की रात ब्लॉगर साथी विवेक रस्तोगी जी के यहाँ भोजन का निमंत्रण था। हमारे होटल से यह दूरी लगभग 20 किमी तो होगी ही, आना-जाना 40 किमी और उसी रास्ते से हम्पी जाना था। तब विवेक रस्तोगी जी से उनके यहां ही रात रुकने की अनुमति ली गई, जिससे चालिस किमी का फ़ेरा और समय दोनों की बचत होगी। रात हम उनके यहां पहुंच गए। उन्होने अपने घर का जीपीएस दे दिया। कार सीधी जाकर दरवाजे पर ही रुकी।
तीन ब्लॉगर - बी एल पाबला, विवेक रस्तोगी, ललित शर्मा
घर पहुंचने पर विवेक भाई प्रतीक्षा करते मिले, जाते ही पहले स्वादिष्ट भोजन किया और उसके बाद फ़ुरसत में ब्लॉगिंग की दुनिया के भूले बिसरे गीत गाए गए। चर्चा करते हुए काफ़ी रात हो गई, हमें तो सुबह जल्दी हम्पी के लिए निकलना था। इसलिए सो गए। सुबह जल्दी उठकर स्नानाबाद से लौटकर विवेक भाई से विदा ली और गाड़ी गेयर में डाल दी। इनका घर सुरक्षित कालोनी में है। हमारी गाड़ी अब हम्पी के रास्ते पर दौड़ रही थी। हमें लगभग साढे तीन सौ किमी का सफ़र तय करके हम्पी पहुंचना था। 
हाईवे पर ब्लॉगर
सुबह जल्दी प्रारंभ किया गया सफ़र हमेशा सुखदाई होता है, सफ़र जल्दी तय होता और शहरी इलाके में ट्रैफ़िक कम रहता है। वरना बड़े शहर से बाहर निकलते हुए ही एक घंटा से अधिक समय खराब हो जाता है। हमारी गाड़ी हाईवे पर सपाटे से चल रही थी। साढे तीन सौ किमी का सफ़र तय करने में कम से कम छ: घटे तो लगने ही थे। साढे सात बजे के लगभग नाश्ते की आवश्यकता महसूस होने लगी।
खाने का नाश माने नाश्ता
हमने नेलमंगला स्थान पर इडली बनते देखकर गाड़ी रोकी। यहाँ एक मशीन से बड़ी इडली बन रही थी। हमने इडली खाई, परन्तु यहां की चटनी सांभर में वो मजा नहीं आया, जो हैदराबाद में मिला था। नाश्ते के बाद आगे का सफ़र तय करने के लिए चल दिए।
पवन पंखे का ब्लेड
चित्रदुर्ग से हमने हाईवे छोड़ दिया स्टेट हाईवे पर आ गए। अब हमारी गाड़ी की रफ़्तार कम हो गई। रास्ते पर एक स्थान पर छोटी डूंगरी पर इकलौता वृक्ष दिखाई दिया। ऐसा ही हमें हैदराबाद से बैंगलोर आते समय दिखा था। गाड़ी रोक कर इसकी फ़ोटो ली। इधर हवा से बिजली बनाई जाती है, इसके पंखे जगह जगह पर लगे हुए हैं। गाड़ियों में भी इनकी पंखुड़ियां ट्रांसपोर्ट होती दिखाई दे रही थी। एक पंखुड़ी ही एक गाड़ी में ट्रांसपोर्ट हो रही थी। इससे पंखुड़ी के साईज का पता चल रहा था। बड़ी कम्पनियां यहां पवन उर्जा के टावर लगाकर मोटा पैसा बना रही हैं। राजस्थान के जैसलमेर क्षेत्र में ऐसा ही दिखाई देता है।
विजयनगर साम्राज्य हम्पी का हौसपेट द्वार
हम डेढ बजे हौसपेट से प्राचीन विजयनगर साम्राज्य के द्वार पर पहुंच चुके थे। द्वार देखकर ही मन खिल गया। इसके दांए तरफ़ प्रस्तर के नागदेवता विराजमान हैं और बांए तरफ़ कूप आराम वाटिका है। हमने गाड़ी रोकर इनकी फ़ोटो ली, क्योंकि हमारा वापसी का मार्ग तय नहीं था। हो सके कि वापसी में इधर आना ही न हो, इसलिए कल पर छोड़ने के बजाय आज ही चित्र ले लो। 
की होल कूप ( कूप आराम वाटिका)
यहां से हम्पी का मुख्य गांव कमलापुर पांच किमी की दूरी पर होगा। यहां भारतीय पुरातत्व सर्वेक्षण का मिनी सर्किल है। उसके अधीन ही हम्पी में संरक्षण एवं उत्खनन का कार्य होता है। यहां डिप्टी एस ए के पद पर एन सी प्रकाश पदासीन है। उनसे फ़ोन पर बात हुई, कमलापुर के अम्बेडकर स्क्वेयर आने कहा।
कमलापुर चौक हम्पी
अम्बेडकर स्क्वेयर के एक रास्ता बेल्लारी तरफ़ चला जाता है। इसी चौक पर सर्वे का दफ़्तर है। हम यहां दो बजे पहुंचे तो डिप्टी एस ए भोजनावकाश पर थे। उनके लौटने तक हम भी भोजन करने के लिए चौक पर आ गए। चौक पर ही साउथ इंडियन खाने का एक अच्छा शाकाहारी होटल है। यहीं हमने भोजन किया, खाना भी एक नम्बर और उम्दा था और खर्च भी कम। एक सौ बीस रुपए हम दोनो का पेटभर भोजन हो गया। जिसमें सांभर, चटनी, दो सब्जी और रोटी थी। भोजन करके लौटने पर डिप्टी एस ए महोदय भोजनावकाश से लौट आए थे। परिचय होने पर उन्होंने अपना एक आदमी हमें गाईड के रुप में हम्पी भ्रमण के लिए दिया।


हम्पी का भव्य विरुपाक्ष मंदिर एवं उसका स्थापत्य - दक्षिण यात्रा 10

म्पी के लैंडमार्क के रुप में यहां के विट्ठल मंदिर का पाषाण गरुड़रथ दिखाया जाता है। यह गरुड़रथ हम्पी की पहचान बन गया है। हम्पी पहुंचने से पहले मैने इस प्राचीन नगर के विस्तार के विषय में सोचा ही नहीं था। मेरी सोच से भी बढ़कर मैने इसे पाया। सबसे पहले हम विरुपाक्ष मंदिर गए। यह मंदिर सतत पूजित है, यहां अभी भी उत्सव एवं पूजा होती है। नगर विन्यास की दृष्टि से देखा जाए तो इसे वर्तमान आधुनिक शहरों की तरह ही बसाया गया है। विजयनगर साम्राज्य की यह राजधानी अपने समय में बहुत ही सुंदर रही होगी। खंडहर बताते हैं इस नगर का रुतबा क्या रहा होगा। यह राजधानी तुंगभद्रा नदी को मध्य में लेकर कई गाँव को मिलाकर बसी हुई है। 
विरुपाक्ष मंदिर का गोपुरम
हेमकुट पर्वत से घिरे पन्द्रहवीं सदी में निर्मित विरुपाक्ष मंदिर के मार्ग के दोनो तरफ़ प्राचीन बाजार के अवशेष दिखाई देते हैं प्रस्तर निर्मित स्तंभों पर छतें अभी तक मौजूद हैं। मार्ग के दोनो ओर दो तल्ला दुकानों की कतारें सुव्यवस्थित हैं। गंगाधर ने बताया कि इन दुकानों पर अतिक्रमण करके लोग निवास कर रहे थे, उन्हें पुरातत्व विभाग ने स्थानीय प्रशासन के सहयोग से हटाया। अन्यथा यह पुरातात्विक धरोहर भी खतरे में थी। ऐसा ही बाजार की बसाहट सिरपुर में देखने मिलती है। यहीं विरुपाक्ष मंदिर का विशाल गोपुरम दिखाई देता है। यह गोपुरम सात तल का है। पहला तल प्रस्तर निर्मित है, इसके बाद सभी तल ईंटों से बनाए गए हैं, जिन पर चूने से लिपाई की गई है। यहां के सभी मंदिर इसी तरह निर्मित हैं। उनकी छत तक प्रस्तर निर्मित है, उसके बाद के निर्माण ईंटों के हैं।
व्यवस्थित प्राचीन बाजार स्थल
गोपुरम से प्रवेश करने पर विशाल प्रांगण है, इसके बांई तरफ़ मंदिर का हाथी बंधा हुआ है, इसके पीछे पाकशाला है। मंदिर के हाथी के साथ उसके दो महावत भी सोए हुए हैं। उन्होने लेटे हुए आवाज दी और हाथी ने हमारे सिर पर सूंड़ रख कर आशीष दिया। मंदिर में प्रसाद बनाने के लिए जल की व्यवस्था नालियों द्वारा की की गई है। यहां तुंगभद्रा नदी का स्वच्छ जल पाकशाला से होकर प्रवाहित होता है। चावल पसाने के लिए बड़े बड़े प्रस्तर के कुंड हैं और दाल पीसने के बड़े सिल लोढे भी यहां रखे हुए हैं। हांलाकि इनका प्रयोग अब नहीं किया जाता। परन्तु उत्सव के अवसर पर इस पाकशाला में हजारों श्रद्धालुओं का भोजन तैयार होता था।
मंदिर के गज द्वारा ब्लॉगर को आशीष
मंदिर के प्रांगण में दो स्तंभ दिखाई देते हैं, एक स्तंभ लकड़ी का बना हुआ है, दूसरा प्रस्तर निर्मित है। प्रस्तर निर्मित स्तंभ पर राजकीय चिन्ह है तथा लकड़ी का स्तंभ ध्वजा आदि के काम लिया जाता रहा होगा। मंदिर परिसर के सभी स्तंभ प्रतिमाओं एवं लता वल्लरियों से अलंकृत हैं। मंदिर के द्वार पर एक स्तंभ में नंदी अंकित है तथा उसके शीर्ष पर दोनो तरफ़ चाँद एवं सूर्य हैं तथा नीचे के भाग में स्थानीय लिपि में लेख अंकित है। अब यहां की लिपि न जानने के कारण अभिलेख से वंचित रह गए और सर्वे के दफ़्तर में भी जानकारी लेना भूल गए। 
विरुपाक्ष मंदिर का प्रांगण
विरुपाक्ष मंदिर के गर्भगृह के समक्ष विशाल प्रस्तर निर्मित मंडप है, इस मंडप के वितान पर पद्माकंन के साथ रंगों से चित्रकारी की गई है। गर्भगृह में स्वर्णरजत अलंकृति भगवान विरुपाक्ष विराजमान हैं। यहां के पुजारी ने गर्भगृह में ले जाकर मुझसे पूजा करवाई। विरुपाक्ष भगवान के दर्शन करवाए। विरुपाक्ष शिव का ही एक नाम है। विरुपाक्ष का अर्थ सुंदर नेत्रों वाला और भयंकर नेत्रों वाला भी हो सकता है। विरुपाक्ष भगवान के रुप के विषय में आगे चर्चा करेगें। 
भगवान विरुपाक्ष स्वामी हम्पी
गर्भगृह के दांई तरफ़ कक्ष में गोपुरम की विलोम छवि दिखाई देती है। इस कक्ष की भित्ति पर एक छिद्र से प्रकाश आता है और वही प्रकाश भित्ति पर विलोम छवि का निर्माण करता है। ठीक आधुनिक पिन होल कैमरे की छवि जैसे। पन्द्रहवीं सदी के वास्तुकारों को इस तकनीकि का ज्ञान था, यह बड़ी बात है। जबकि कैमरे का अविष्कार को उन्नीसवीं सदी में हुआ था। उसके बाद ही आगे चलकर कैमरा की तकनीक परिष्कृत होती गई और पिन होल कैमरे का जन्म हुआ। लगभग 300 फ़ुट से अधिक दूरी की छवि को एक छिद्र से भित्ति पर दिखाना उस सदी का बहुत बड़ा चमत्कार एवं क्रांतिकारी अविष्कार ही कहा जाएगा और यह तकनीक वर्तमान में भी अपना कार्य कर रही है।
पिन होल से गोपुरम का दृश्य
इस मंदिर के गोपुड़ा का निर्माण राजा कृष्णदेव राय ने करवाया था। दांई तरफ़ स्थिति गोपुरम से बाहर निकलने पर एक काफ़ी बड़ी पुष्करी है। इस पुष्करी का निर्माण पत्थरों से किया गया है। जिसमें चारों तरफ़ पैड़ियां बनी हुई है। धार्मिक कर्मकांड यहां पर सम्पन्न करवाए जाते हैं तथा गोपुरम की छवि पुष्करी के जल में दिखाई देती है। गोपुरम की भित्ति में मंदिर की तरफ़ राजा कृष्णदेव राय की खड़गधारी करबद्ध स्थानक मुद्रा में छवि अंकित की गई और इसके साथ उनका नाम भी खुदा हुआ है। इस तरह किसी राजा की छवि मुझे पहली बार किसी म।द्निर में दिखाई दी जिसके साथ उसका नाम भी अंकित हो। मंदिर निर्माण करवाने वाले राजा की पत्नी सहित छवि तो अनेक स्थानो पर मिलती है।
पुष्करणी एवं गोपुरम
विरुपाक्ष मंदिर तो यह अपनी तरह अनोखा मंदिर है। पन्द्रहवी शताब्दी में निर्मित इस मंदिर की पुर्व दिशा में विशाल नंदी विराजमान है, दक्षिण दिशा में में गणेश जी विशाल प्रतिमा है। इसके साथ  ही द्वार पर तीन मुखी नंदी भी स्थापित है। तीन मुखी नंदी मैने पहली बार देखा। यहां विष्णु के नृसिंह अवतार की विशाल प्रतिमा है। विरुपाक्ष मंदिर तल से शिखर तक पचास मीटर ऊंचा है। इस प्रांगण में विरुपाक्ष मंदिर से भी प्राचीन कई छोटे छोटे मंदिर है। भगवान शिव को समर्पित इस मंदिर में राजा कृष्णदेव राय ने अपने अभिशेक के समय गोपुड़ा का निर्माण करवाया था। इस मंदिर को पंपापति नाम से भी जाना जाता है। अर्थात इस नगर का प्राचीन नाम पंपा था एवं इसके मालिक पंपापति अर्थात विरुपाक्ष भगवान हैं।
विरुपाक्ष मंदिर का मंडप एवं गर्भगृह 
प्रत्येक प्रसिद्ध स्थान के कुछ न कुछ किंवदन्तियां भी जुड़ी रहती हैं। इसके साथ किंवदंती है कि भगवान विष्णु ने इस जगह को अपने रहने के लिए कुछ अधिक ही बड़ा समझा और अपने घर वापस लौट गए। विरुपाक्ष मन्दिर में भूमिगत शिव मन्दिर भी है। मन्दिर का बड़ा हिस्सा पानी के अन्दर समाहित है, इसलिए वहाँ कोई नहीं जा सकता। बाहर के हिस्से के मुक़ाबले मन्दिर के इस हिस्से का तापमान बहुत कम रहता है। हालांकि हम्पी एक प्राचीन शहर है और इसका जिक्र रामायण में भी किया गया है और इतिहासकारों के अनुसार इसे किष्किन्धा के नाम से बुलाया जाता था, वास्तव में 13वीं से 16वीं सदी तक यह शहर विजयनगर राजाओं की राजधानी के रुप में समृद्ध हुआ।
राजा कृष्णदेव राय की प्रतिमा
विरूपाक्ष नाम भी वेद प्रसिद्ध है। महानारायाण उपनिषद् विरूपाक्ष को बार–बार प्रणाम करती है– विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नम:। विषमणि विविधशक्तीफीन्यक्षीणि विलक्षणानि वाक्षाणि। हर! हेमकूटशैले लिंगे व्यक्तोSस्यतो विरूपाक्ष:।। अर्थात् हे हर! आपके लोचंन विषम है, आप विविध शक्तियों वाले हैं, आपकी इन्द्रियाँ विलक्षण है और आप हेमकूट पर्वत पर विरूपाक्ष लिंग रूप से स्थापित हैं अतएव आप विरूपाक्ष कहे जाते हैं। वस्तुत: हमारी इन्द्रियाँ विषय को देखती हैं और शिव की इन्द्रियाँ चेतन को देखकर मानो विषय को नंगा कर देती हैं इसलिए उन्हें विरूपाक्ष कहा जाता है। …… विरुपाक्ष मंदिर दर्शन कर हम विट्ठल मंदिर की ओर चल दिए।

स्थापत्य कला का अद्भुत नमूना विट्ठल मंदिर हम्पी : दक्षिण यात्रा 11

विजयनगर साम्राज्य की राजधानी हम्पी को मंदिरों का नगर कहा जाए तो कोई अतिश्योक्ति नहीं होगी। क्योंकि यहां शैव, वैष्णव, शाक्त सभी पंथो का प्रतिनिधित्व करते हुए मंदिरों का निर्माण भव्यता के साथ हुआ है। विरुपाक्ष स्वामी मंदिर शिव को, विट्ठल मंदिर विष्णु को एवं माता मंदिर देवी को समर्पित है। इसके साथ ही जैन मंदिर एवं मठ भी है। इससे स्पष्ट होता है कि विजय नगर साम्राज्य में सभी पंथो का समान आदर था। अगर हम्पी नगर का भ्रमण करना है तो कम से कम पर्यटक के पास 3 दिन का समय होना चाहिए तथा वाहन भी। क्योंकि सभी मंदिर एवं स्मारक दो-चार किमी की दूरी पर है। यहाँ किराये पर सायकिल मिलती है, जिससे भ्रमण किया जा सकता है।
तलारी गट्टा द्वार
विरुपाक्ष मंदिर के दर्शनों के पश्चात हम विट्ठल मंदिर पहुंचे यह मंदिर से पूर्व दिशा की ओर लगभग 5 किमी की दूरी पर है। विट्ठल मंदिर के लिए तलारीगट्टा द्वार से होकर जाना पड़ता है। तलारी गट्टा का अर्थात चुंगी द्वार। इस द्वार से प्रवेश करने वाले व्यापारी से यहां चुंगीकर वसूल किया जाता था। 
बैटरी चलित वाहन को चलाती लड़की
यह मंदिर तुंगभद्रा नदी के दक्षिणी किनारे पर है। यहां पहुंचने पर मंदिर एक किमी पहले वाहन पार्किंग में खड़े करवा लिए जाते हैं, इसके बाद यहां से बैटरी चलित वाहन से मंदिर तक ले जाया जाता है। इन वाहनों को यहां के गांव की लड़कियाँ चलाती हैं। मुझे कर्नाटक सरकार का यह कार्य पसंद आया। अधिक लड़कियां विद्यार्थी हैं, जो पार्ट टाईम में वाहन चलाकर कुछ खर्च जुटा लेती हैं।
विट्ठल मंदिर का दृश्य
कड़प्पा पत्थरों का शहर होने के कारण यहाँ के सभी भवन पत्थरों से ही निर्मित है। मंदिरों के प्रथम तल कड़प्पा पत्थरों से बने हुए हैं और ऊपर के तल में ईंटों का प्रयोग हुआ है। कड़प्पा पत्थर अधिक सख्त होता है, इसलिए इस पर नक्काशी का काम सावधानी एवं कठिन परिश्रम भी मांगता है। विट्ठल मंदिर के गोपुरम का शीर्ष भाग भग्न हो चुका है। इसकी निर्माण शैली में इस्लामिक प्रभाव नहीं है, यह विशुद्ध हिन्दू शैली में निर्मित है। इसके मुख्यद्वार पर शिलापट का उपयोग हुआ है। द्वार पदतल शिला पर दंडवत होकर प्रणाम करते हुए मनुष्यों का अंकन दिखाई देता है। स्थापत्य की दृष्टि से यह मंदिर मूल दक्षिण भारतीय द्रविड़ मंदिरों की स्थापत्य शैली का प्रतिनिधित्व करता है।
हम्पी का लैंडमार्क गरुड़ रथ
इस मंदिर का निर्माण सोलहवीं सदी में राजा कृष्णदेव राय द्वारा किया गया बताया जाता है। मुख्य द्वार से प्रवेश करने पर हम्पी के लैंडमार्क गरुड़ रथ का पार्श्व भाग दिखाई देता है। यह मंदिर के विशाल प्रांगण के मध्य में रखा हुआ है। इसे इस तरह स्थापित किया गया है कि मंदिर के गर्भगृह भगवान विट्ठल को गरुड़ रथ में विराजित होकर देखता रहे। मंदिर के गर्भगृह से गरुड़ रथ का द्वार दिखाई देता है। गरुड़ रथ का निर्मान एकाश्म चट्ठान से करने की बजाए, पत्थर से किया गया है। जिस तरह लकड़ी से रथ के सभी अंगों को बनाकर जोड़ा जाता है, इसी तरह गरुड़ रख में पत्थर से बनाकर रथ के सभी अंगों को जोड़ा गया। जिसे पत्थर के बने दो हाथी खींच रहे हैं। पहले इसे घोड़े खींचा करते। घोड़े को किसी ने भग्न कर दिया तो उसी पत्थरों को शिल्पकार ने हाथी की आकृति में बदल दिया। इसके प्रमाण स्वरुप रथ में जुते घोड़े की टांगे दिखाई देती हैं।
महामंडप - इसके ही स्तंभों से मधुर ध्वनि निकलती है।
मंदिर में महामंडप, रंग मंडप एवं अन्य कई मंडप हैं, महामंडप की छत भग्न हो चुकी है। इस महामंडप में जड़ित 56 स्तंभ हैं, जिन्हें थपथपाने मधुर संगीत सुनाई देता है। प्रत्येक स्तंभ से अलग तरह का स्वर निकलता है। सुरक्षा की दृष्टि से स्तंभो के थपथपाने पर प्रतिबंध लगा दिया है। महामंडप के पश्चात गर्भगृह है, जो प्रतिमा विहीन है। मंदिर के गर्भगृह द्वार पर नदी देवियों के स्थान द्वारपाल बनाए गए हैं। द्वार शिलापट पर गजाभिषिक्त लक्ष्मी अंकित हैं। अधिष्ठान रिक्त है, यहां अवश्य ही विष्णु विग्रह रहा होगा। विट्ठल देव मंदिर हम्पी का सर्वाधिक अलंकृत मंदिर है। इसकी खूबसूरती देखते ही बनती है। सिंह व्याल, गज व्यालादि का अंकन प्रस्तर भित्तियों पर दिखाई देता है।
रंग मंडप का भीतरी भाग
गर्भगृह की भित्तियों पर रामायण की कथा का चित्रण किया गया है। जिसमें राजा दशरथ द्वारा पुत्रेष्टि यज्ञ। अशोक वाटिका में हनुमान द्वारा सीता को राम मुद्रिका देना, वानर सेना का सीता जी खोज करने का अंकन प्रमुख है। इसके साथ ही लक्ष्मी नारायण इत्यादि को प्रदर्शित किया गया है। बाहरी भित्ति पर पद्मासन लगाए हुए ध्यानरत साधु का अंकन किया गया है। यह आद्य शंकराचार्य हो सकते हैं। इसके साथ ही रामायण के अन्य प्रसंगों का चित्रण भी महत्वपूर्ण है। इस मंदिर को देखने के लिए भरपूर समय चाहिए। पर हमारे पास समय की कमी थी, सांझ ढल रही थी, इसलिए हम जल्दी से जल्दी और अधिक से अधिक अपने कैमरे में कैद कर लेना चाहते थे। फ़िर भी बहुत कुछ छूट गया। 
अशोक वाटिका में सीता जी
इससे तो सभी विज्ञ है कि प्राचीन काल में भारत में तकनीकि विज्ञान अपने चरमोत्कर्ष पर था। जहाँ पुष्पक विमान से लेकर अन्य आश्चर्यचकित करने वाली तकनीकि सामने आई। विट्ठल मंदिर की बाहरी भित्ति में उत्कीर्ण एक प्रतिमा में दो चक्के का स्कूटर दिखाया गया है। जिसमें हैंडिल भी है और इक स्त्री इसे फ़र्राटे से संचालित करते हुए दिखाई दे रही है। उसने एक हाथ में स्कूटर का हैंडिल पकड़ा हुआ है और दूसरे हाथ में खड्ग दिखाई दे रही है। अवश्य ही यह युद्ध का चित्रण किया गया है, स्कूटर सवार वेगवती स्त्री हाथ में खडग लेकर जैसे अरिसेना को ललकार कर आगे बढ़ती हुई दिखाई दे रही है। इस तरह दो चक्कों के इलेक्ट्रानिक स्कूटर आज दिखाई देते हैं। वैसे भी स्कूटर का अविष्कार उन्नीसवीं सदी की औद्यौगिक क्रांति की देन है। परन्तु विट्ठल मंदिर का यह स्कूटर सोलहवीं शताब्दी में ही तैयार हो गया और संचालन नारी के द्वारा हो रहा है, इससे यह भी जाहिर होता है कि समाज में नारियों की स्थिति शीर्ष पर रही होगी। 
स्वचालित स्कूटर सवार स्त्री
विट्ठल मंदिर की भव्यता ऐसी है कि दर्शक ठगा सा खड़ा रह जाएगा। प्रस्तर स्थापत्य का अद्भुत कार्य यहाँ देखने को मिलता है। मंदिर की सुरक्षा परिखा काफ़ी मजबूत बनाई गई है। इसके साथ ही यहां फ़ूल बाजार भी है।  इस स्थान पर मंदिर में अर्पण करने एवं अन्य कार्यों के फ़ूलों का विक्रय होता था। इसके साथ ही अन्य सामान भी मिलता होगा। प्रस्तर स्तंभों से निर्मित बाजार की दुकानें अपने वैभव का गुणगान स्वत ही करती हैं। दुकानों के मध्य प्रतिमा विहीन एक मंदिर भी है। इस मंदिर किस देवता का विग्रह स्थापित था और किसे समर्पित था, इसकी जानकारी मुझे प्राप्त नहीं हो सकी। मंदिर का दर्शन करके हम सन सेट पाईंट की लौट गए।
राम मंदिर हम्पी का गोपुरम
सन सेट पाईंट एक पहाड़ी पर स्थित है। यहाँ से अस्ताचल को जाते हुए सूर्य का दृश्य सुंदर दिखाई देता है। यहां बड़े परकोटे घिरा हुआ राम मंदिर भी है। यह अयोध्या की हनुमानगढ़ी से संचालित होता है। इस मंदिर का गोपुरम छोटा है तथा द्वार शीर्ष पर गजलक्ष्मी का अंकन है। भीतर प्रवेश करने पर चतुष्टिका में लगे हुए शिलालेख दिखाई देते हैं तथा एकाश्म प्रस्तर का एक स्तंभ भी गड़ा हुआ है। शायद इस पर गरुड़ विराजमान रहे होगें। परन्तु अभी उपर का हिस्सा रिक्त है। मंदिर का गर्भगृह एकाश्म चट्टान को खोद कर गुहानुमा बनाया गया है। तथा उसी चट्टान को निर्माण में सम्मिलित करते हुए महामंडप का निर्माण किया गया है। हम जब पहुंचे तो यहाँ रामचरित मानस का अखंड पाठ जारी था।
सुर्यास्त स्थल पर हनुमान जी
मंदिर के पीछे पहाड़ी से सूर्यास्त देखा जाता है। जब हम पहुंचे तो सुर्य अस्ताचल को जा चुके थे, थोड़ी सी लालिमा दिखाई दे रही थी। इस स्थान पर बहुत से पर्यटकों के पहले से ही डेरा जमा रखा रखा था। यहां एक चट्टान पर कई शिवलिंग बने हुए हैं। जिस पर लोग पुष्प चढा रहे। पर्यटक सूर्यास्त की फ़ोटो खींचने में व्यस्त थे। एक व्यक्ति गदाधारी हनुमान जी का रुप धरकर उनसे कुछ दक्षिणा मिलने की उम्मीद लगाए, पूंछ हिलाते खड़ा था। यहां की फ़ोटो लेते हुए अंधेरा होने लगा था। इसके बाद हम कमलापुर लौट आए। आर्कियोलॉजी के गेस्ट हाऊस में रुम खाली न होने पर हमने एक होटल में रुम लिया और पुन: अम्बेडकर सर्किल के होटल में भोजन कर विश्राम गति को पहुंच गए।

हम्पी का शाही स्नानघर, पुष्करणी एवं महानवमी उत्सव : दक्षिण यात्रा 12

आज हमें हम्पी नगर का बहुतेरा भाग देखना था। पाबला जी ने निर्णय ले लिया था कि 10 बजे तक हम्पी छोड़ देगें। हमने तैयार होकर उड़ूपी रेस्तरां में इडली का नाश्ता किया, तब तक हमारा गाईड गंगाधर भी आ गया था। सबसे पहले हम शाही स्नानघर पहुंचे। रानियों के स्नान के लिए विशेष कुंड का निर्माण किया गया था जिसमें बाहर की दीवारों में ढके हुए झरोखे हैं जिनसे हवा का आवागमन हो सके।  चौरस रानी कुंड की लम्बाई चौड़ाई 30 मीटर है, जिसमें 15 मीटर लम्बाई चौड़ाई एवं डेढ मीटर गहराई है। इसमें चारों तरफ़ झरोखे बने हुए हैं, जहां बालकनियाँ भी बनी हुआ हैं और सुंदर अलंकरण किया गया है। 
शाही स्नान घर हम्पी
इसके चारों तरफ़ बरामदा है जिसकी छत मेहराबों पर टिकी हैं। इस इमारत पर मुस्लिम स्थापत्य का पूर्ण प्रभाव दिखाई देता है। इसकी छतों सुंदर आकृति का वितानालंकरण दिखाई देता है। कुंड से जल निकासी एवं जल भराव की व्यवस्था प्रणालिकाओं द्वारा की गई है, जिससे सदैव निर्मल जल प्राप्त हो सके। गर्मी के दिनों में यह स्थान बहुत सुकून देता होगा। आज सिर्फ़ अहसास ही किया जा सकता है। जब जलती बलती ग्रीष्म ॠतु में यहाँ जल किलोल किया जाता होगा तो यह स्थान किसी स्वर्ग से कम नहीं लगता होगा। 
शाही स्नान घर का भीतरी दृश्य
शाही स्नान घर से कुछ दूरी पर सैनिकों की बैरकें हुआ करती थी। यहां सैनिकों के लिए किसी स्थाई संरचना का निर्माण नहीं दिखाई देता। परन्तु उनके भोजन करने के लिए जल की व्यवस्था दिखाई देती है। यहाँ तुंगभद्रा का जल प्रणालिकाओं के माध्यम से पहुंचाया जाता है, जिससे सैनिक जल द्वारा अपना नित्य कार्य स्नान भोजन इत्यादि कर सकें। स्थान का निरीक्षण करने पर प्रतीत होता है कि सैनिकों के रहने के लिए तंम्बु आदि की अस्थाई व्यवस्था की जाती रही होगी। वर्तमान में भी सैनिकों के अस्थाई निवास के लिए तम्बुओं की व्यवस्था ही होती है।
महानवमी उत्सव मंच हम्पी
यहां से हम शाही आवास परिसर की ओर चल दिए। विदित हो कि विजयनगर साम्राज्य (हम्पी) के तुलुवा वंश के राजा कृष्ण देव राय वैष्णवधर्मी थे। परन्तु उन्होनें सभी पंथो एवं धर्मों का आदर किया। उनके कार्यकाल में बने हुए भवनों के वास्तुशिल्प में यह स्पष्ट परिलक्षित होता है। हिन्दू शैली के साथ मुगल शैली का समावेश निर्माण में हुआ है। उनमें उत्सव धर्मिता की भी कमी नहीं थी। महानवमी (रामनवमी) पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया जाता था जिसमें राज्य भर की प्रजा उपस्थित होकर सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ उत्सव का आनंद लेती थी। उनके कार्यकाल में राज्य में विदेशियों का आगमन भी होता था। वे व्यापार करने, घोड़े बेचने एवं अपने कला कौशल प्रदर्शित करने के लिए आते थे।

नृत्य उत्सव का प्रदर्शन
उत्सव के आयोजन के लिए राज परिसर में भव्य मंच का निर्माण किया गया था। जिसे महानवमी दिबा कहा जाता है। यह वर्गाकार मंच 22 फ़ुट ऊंचा एवं 80 फ़ुट लम्बा एवं चौड़ा वर्गाकार है। इसे राजा कृष्ण देव राय ने उड़ीसा के गजपति शासकों की विजय पर स्मृति के रुप में बनवाया था। इस पर चढने के लिए सामने से पैड़ियाँ बनी हुई हैं और पार्श्व में दस फ़ुट ऊंचा द्वार बना हुआ है, जिससे भीतर से इस पर पहुंचा जा सकता है। हो सकता है इसका प्रयोग राजा के आगमन एवं कलाकारों के मंच पर पहुंचने के लिए किया जाता होगा। जब अचानक कलाकर मंच पर पहुंचता होगा तो दर्शक विस्मय से देखते होते होंगे।

चतुरंगिणी सेना का प्रदर्शन
इस मंच के निर्माण में कला कौशल का भरपूर प्रयोग किया गया है, यह भी वहां उपलब्ध कड़प्पा प्रस्तर से ही बनाया गया है। ऊंचे अधिष्ठान के ऊपर गजथर का निर्माण किया गया है। इसके बाद अन्य पशुओं एवं उनके कारनामों को दिखाया गया है। छोटे गवाक्षों के साथ नृत्यरत सुंदरियों को दिखाया गया है। युद्धरत सैनिकों एवं हाथियों के करतबों को मंच की भित्तियों में स्थान दिया गया है। इनके राज्य में विदेशी राजदूत भी आते थे, उनका भी चित्रण किया गया है।  हिन्दुओं के त्यौहारों का शिल्पांकन किया गया है। विशेषकर होली पर ढफ़ बजाते हुए एवं नृत्य करते  हुए दिखाया गया। 
जल प्रबंधन के लिए प्रस्तर प्रणालिकाएँ
इस मंच का उपयोग कौतुक प्रदर्शन से लेकर, गायन, वादन, नृत्य एवं अन्य प्रतियोगिताओं के संचालन के लिए होता था। मंच के समक्ष बैठ कर देखने के लिए काफ़ी बड़ा मैदान है तथा इसके सामने पुष्करी का निर्माण भी किया गया है। जिससे आने वाले दर्शकों को पेयजल उपलब्ध हो सके। मंच की बांई तरफ़ की दीवार पर चतुरंगणी सेना को दिखाया गया है, जिसमें हाथी, घोड़े ऊंट एवं पैदल सेना का चित्रण किया गया है। इससे जाहिर होता है कि राजा के पास सुदृढ सेना थी, जिसके बल पर उसने पूरे दक्षिण भारत को फ़तह कर लिया और विजयनगर साम्राज्य की स्थापना की। उत्सव के लिए इतना बड़ा मंच मुझे अन्य किसी स्थान पर देखने नहीं मिला। महानवमी का त्यौहार अवश्य ही राजकीय त्यौहार के रुप में मनाया जाता रहा होगा।
शाही आवास क्षेत्र स्थित पुष्करणी
महानवमी दिबा के समक्ष पुष्करणी एवं कुंआ बना हुआ है। तुंगभद्रा नदी का जल नहरों एवं प्रस्तर प्रणालिकाओं के माध्यम से योजनाबद्ध रुप से सारे नगर में पहुंचाया जाता था। पुष्करणी में जल निकासी एवं भराव की व्यवस्था दिखाई देती है। इसका निर्माण काले पत्थर से किया गया है। जिसमें समकोण बनी हुई पैड़ियां पुष्करणी की सुंदरता में चार चाँद लगाती दिखाई देती हैं। इसके आगे ही चौरीसी स्तंभों की इमारत है। जिसके स्तंभों के चिन्ह मात्र दिखाई देते हैं बाकी पुरा परिसर काल के गाल में समा गया है। समय की मार से सब ढह गया। जो कुछ बचा है, उसे आज पर्यटक देखने आते हैं।

विजयनगर साम्राज्य का समृद्ध इतिहास : दक्षिण यात्रा 13

लते-चलते एक नजर विजयनगर साम्राज्य के इतिहास पर भी डालते हैं। वर्तमान के खंडहरों में जो विजयनगर राज्य का वैभव दिखाई देता है, उसे बनाने में कई पीढिया बीत गई। तब कहीं जाकर आज भव्य भवन, सुव्यवस्थित बाजार, नगर सुरक्षा, जल प्रबंधन, नगर प्रबंधन, सैनिक छावनी, शस्त्रागार, अन्नागार, वास्तु शिल्प एवं प्रतिमा शिल्प दिखाई दे रहा है। अगर उस काल में किसी भी राजा ने देखा होगा तो इसी तरह की राजधानी बनाने की कल्पना की होगी और यहाँ के एश्वर्य से अचम्भित अवश्य हुआ होगा। विजयनगर साम्राज्य (1336-1646) मध्यकालीन दक्षिण भारत का एक साम्राज्य था। इसके राजाओं ने 310 वर्ष राज किया। 
विरुपाक्ष मंदिर के पुजारी एवं कथा का सुत्रधार ब्लॉगर
विजयनगर राज्य का वास्तविक नाम कर्णाटक साम्राज्य था। इसकी स्थापना हरिहर प्रथम और बुक्का राय प्रथम नामक दो भाइयों ने की थी। दोनो भाई युद्ध प्रेमी एवं कुशल रणनीतिकार थे पुर्तगाली इसे बिसनागा राज्य के नाम से जानते थे।इस राज्य की 1567 में भारी पराजय हुई और राजधानी विजयनगर को जला दिया गया। उसके पश्चात क्षीण रूप में यह और 80 वर्ष चला। राजधानी विजयनगर के अवशेष आधुनिक कर्नाटक राज्य में हम्पी शहर के निकट पाये गये हैं और यह एक विश्व विरासत स्थल है। पुरातात्त्विक खोज से इस साम्राज्य की शक्ति तथा धन-सम्पदा एवं वैभव का पता चलता है।
विजयनगर साम्राज्य की भव्यता की दास्तान कहते खंडहर
विजयनगर राज्य में चार विभिन्न वंशों ने शासन किया। प्रत्येक वंश में प्रतापी एवं शक्तिशाली नरेशों की कमी न थी। युद्धप्रिय होने के अतिरिक्त, सभी हिंदू संस्कृति के रक्षक थे। स्वयं कवि तथा विद्वानों के आश्रयदाता थे। हरिहर तथा बुक्क संगम नामक व्यक्ति के पुत्र थे अतएव उन्होंने संगम सम्राट् के नाम से शासन किया। विजयनगर राज्य के संस्थापक हरिहर प्रथम ने थोड़े समय के पश्चात् अपने वरिष्ठ तथा योग्य बंधु को राज्य का उत्तराधिकारी घोषित किया। संगम वंश के तीसरे प्रतापी नरेश हरिहर द्वितीय ने विजयनगर राज्य को दक्षिण का एक विस्तृत, शक्तिशाली तथा सुदृढ़ साम्राज्य बना दिया।
शाही आवास क्षेत्र विजयनगर साम्राज्य ह्म्पी
हरिहर द्वितीय के समय में सायण तथा माधव ने वेद तथा धर्मशास्त्र पर निबंधरचना की। उनके वंशजों में द्वितीय देवराय का नाम उल्लेखनीय है जिसने अपने राज्याभिषेक के पश्चात् संगम राज्य को उन्नति का चरम सीमा पर पहुँचा दिया। मुसलमानी रियासतों से युद्ध करते हुए, देबराय प्रजापालन में संलग्न रहा। राज्य की सुरक्षा के निमित्त तुर्की घुड़सवार नियुक्त कर सेना की वृद्धि की। उसके समय में अनेक नवीन मंदिर तथा भवन बने। दूसरा राजवंश सालुव नाम से प्रसिद्ध था। इस वंश के संस्थापक सालुब नरसिंह ने 1487 से 1490 ई. तक शासन किया। उसने शक्ति क्षीण हो जाने पर अपने मंत्री नरस नायक को विजयनगर का संरक्षक बनाया।
स्तंभ एवं भग्नावशेष विजाय्नगर साम्राज्य हम्पी
यही नरस नायक, तुलुव वंश का प्रथम शासक माना गया है। उसने 1490 से 1509 ई. तक शासन किया और दक्षिण में कावेरी के सुदूर भाग पर भी विजयदुंदुभी बजाई। तुलुब वंशज कृष्णदेव राय का नाम गर्व से लिया जाता है। उसने 1509 से 1539 ई. तक शासन किया। वह महान प्रतापी, शक्तिशाली, शांतिस्थापक, सर्वप्रिय, सहिष्णु और व्यवहारकुशल शासक था। उसने नायक लोगों को दबाया, उड़ीसा पर आक्रमण किया और दक्षिण के भूभाग पर अपना अधिकार स्थापित किया। सोलहवीं सदी में यूरोप से पुर्तगाली भी पश्चिमी किनारे पर आकर डेरा डाल चुके थे। उन्होंने कृष्णदेव राय से व्यापारिक संधि की जिससे विजयनगर राज्य की श्रीवृद्धि हुई।
विहंगम दृश्य विजयनगर साम्राज्य ह्म्पी
तुलुव वंश का अंतिम राजा सदाशिव परंपरा को कायम न रख सका। सिंहासन पर रहते हुए भी उसका सारा कार्य रामराय द्वारा संपादित होता था। सदाशिव के बाद रामराय ही विजयनगर राज्य का स्वामी हुआ और इसे चौथे वंश अरवीदु का प्रथम सम्राट् मानते हैं। रामराय का जीवन कठिनाइयों से भरा पड़ा था। शताब्दियों से दक्षिण भारत के हिंदू नरेश इस्लाम का विरोध करते रहे, अतएव बहमनी सुल्तानों से शत्रुता बढ़ती ही गई। मुसलमानी सेना के पास अच्छी तोपें तथा हथियार थे, इसलिए विजयनगर राज्य के सैनिक इस्लामी बढ़ाव के सामने झुक गए। विजयनगर शासकों द्वारा नियुक्त मुसलमान सेनापतियों ने राजा को घेरवा दिया अतएव सन् 1565 ई. में तलिकोट के युद्ध में रामराय मारा गया। मुसलमानी सेना ने विजयनगर को नष्ट कर दिया जिससे दक्षिण भारत में भारतीय संस्कृति की क्षति हो गई। 
विरुपाक्ष मंदिर के समक्ष स्थापित भव्य नंदी
अरवीदु के निर्बल शासकों में भी वेकंटपतिदेव का नाम विशेषतया उल्लेखनीय है। उसने नायकों को दबाने का प्रयास किया था। बहमनी तथा मुगल सम्राट् में पारस्परिक युद्ध होने के कारण वह मुसलमानी आक्रमण से मुक्त हो गया था। इसके शासनकाल की मुख्य घटनाओं में पुर्तगालियों से हुई व्यापारिक संधि थी। शासक की सहिष्णुता के कारण विदेशियों का स्वागत किया गया और ईसाई पादरी कुछ सीमा तक धर्म का प्रचार भी करने लगे। वेंकट के उत्तराधिकारी निर्बल थे। शासक के रूप में वे विफल रहे और नायकों का प्रभुत्व बढ़ जाने से विजयनगर राज्य का अस्तित्व मिट गया।
सुरक्षा चौकी विजयनगर साम्राज्य हम्पी
विजयनगर के शासक गण राज्य के सात अंगों में कोष को ही प्रधान समझते थे। उन्होंने भूमि की पैमाइश कराई और बंजर तथा सिंचाइवाली भूमि पर पृथक्-पृथक् कर बैठाए। चुंगी, राजकीय भेंट, आर्थिक दंड तथा आयात पर निर्धारित कर उनके अन्य आय के साधन थे। विजयनगर एक युद्ध राज्य था अतएव आय का दो भाग सेना में व्यय किया जाता, तीसरा अंश संचित कोष के रूप में सुरक्षित रहता और चौथा भाग दान एवं महल संबंधी कार्यों में व्यय किया जाता था। इन शासको में कृष्णदेव राय का नाम अग्रणी रुप से लिया जाता है और कहा जाए तो उनका शासन विजयनगर साम्राज्य का स्वर्ण काल था।

विजयनगर साम्राज्य की गुप्तचर एवं दंड व्यवस्था : दक्षिण यात्रा 13

विजय नगर साम्राज्य के राजा कृष्णदेव राय ने अपने जीवन काल में 14 युद्ध किए और उनमें विजय पाई। दक्षिण में उनका एक क्षत्र साम्राज्य स्थापित हो गया। यह समय हम्पी के लिए स्वर्णकाल माना जा सकता है। इस दौरान राज्य में निर्माण भी प्रचूर मात्रा में हुए। किसी भी साम्राज्य की सुरक्षा के लिए उसकी गुप्तचर प्रणाली सुदृढ होनी चाहिए। गुप्तचर ही राजा के आँख-कान होते हैं, उनके माध्यम से ही राज्य का हाल चाल एवं षड़यंत्रों की सूचना राजा तक पहुंचती है। इन सूचनाओं का परीक्षण कर राजा शत्रुओं एवं षड़यंत्रकारियों से सचेत हो सकता है। वैसे भी इतिहास से ज्ञात होता है कि युद्ध विजयों में गुप्तचरों का विशेष योगदान रहा है।
राजा कृष्ण देव राय
गुप्त शब्द के साथ रोमांच जुड़ा हुआ है। हम्पी में भी कई गुप्त स्थान हैं, जहाँ राजा अपने गुप्तचरों एवं राज्य के विशेष अधिकारियों से गुप्त मंत्रणा करता था। शाही आवास क्षेत्र के मध्यम में एक भूमिगत गुप्त मंत्रणा कक्ष भी बना हुआ है। जिसकी छत वर्तमान में ढह गई है। इस कक्ष का निर्माण काले ग्रेनाईट से किया गया है। लगभग 15X15 लम्बाई चौड़ाई के इस कक्ष के चारों तरफ़ गलियारा है, तथा गलियारे में मशाल लगाने स्थान बने हुए हैं। वर्तमान में उन्मुक्त द्वार कभी गुप्त रहा होगा। कक्ष की छत धरती के समतल है जो वर्तमान में ढह गई है। राजा यहाँ सामरिक महत्व की चर्चा करने सेनापति और महामंत्री के साथ गुप्तचरों से भी भेंट करते रहे होंगे। कभी किसी विशेष कैदी को भी इस स्थान पर रखा जाता होगा।
गुप्त मंत्रणा कक्ष 
बाबू देवकी नंदन खत्री के उपन्यास चंद्रकांता संतति में गुप्तचरों (एयारों) एवं गुप्त कक्षों के माध्यम राज काज का खाका खींचा गया है। बताया क्या है कि गुप्तचर एक राज्य के लिए कितनी महत्वपूर्ण भूमिका निभाते थे। भूमिगत रास्ते, गुप्त मंत्रणा कक्ष, तहखाने, गुप्त यातना गृह एवं कारावास इत्यादि राज्य की व्यवस्था के आवश्यक अंग थे। प्रत्येक किले या दूर्ग के निर्माण के समय सुरक्षा की दृष्टि से कई भूमिगत गुप्त रास्तों का निर्माण किया जाता था। जो वर्तमान में भी हमें किलों में दिखाई देते हैं। इसके साथ खजाने को भी गुप्त रखने की व्यवस्था की जाती थी। जिसकी जिम्मेदारी किसी एक विश्वसनीय के पर होती थी तथा बीजक के माध्यम से खजाने का मार्ग दर्शाया जाता था।
गुप्त मंत्रणा कक्ष का द्वार
हम देखते हैं कि किलों एवं दुर्गों में स्थित कूपों में कई कक्ष एवं द्वार दिखाई देते हैं। कई तलों में इन कूपों का निर्माण किया जाता था तथा उन तक पहुंचने के लिए पैड़ियों का निर्माण किया जाता था। यह कूप भी एक तरह से गुप्त मंत्रणा के कार्य में लिए जाते थे। जब राज्य काज संबंधी कोई आवश्यक चर्चा करनी होती थी तब इन कूपों का उपयोग किया जाता था। इसलिए कूप खनन के दौरान भी उसमें गुप्त कक्ष बनाए जाते थे। चर्चा के दौरान आवाज गुंजित न हो इसलिए दीवारों को मोटा बनाया जाता था। कई स्थानों पर दीवारें कई हाथ मोटी दिखाई देती हैं। चुनारगढ़ के किले के कुंए में भी इस तरह के गुप्त द्वार दिखाई देते हैं। इस तरह राज्य की सूरक्षा के लिए गुप्त कक्ष एवं तहखानों का निर्माण होते थे। 
विजयनगर राज्य का राजकीय आवास क्षेत्र
राज्य को चलाने के लिए दंड विधान की आवश्यकता भी होती है। कभी मानव सभ्यता का एक काल ऐसा भी जब न राजा था, न राज्य था, न दंड था, न दंड था, न दंडी था और सभी लोग मानव धर्म के अनुसार एक दूसरे का सम्मान करते हुए रक्षा करते थे। (न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः। स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥)  दंड की उत्पत्ति राज्यसंस्था की उत्पत्ति के साथ हुई। महाभारत के शांतिपर्व: (56.13-33) में यह कहा गया है कि मानव जाति की प्रारंभिक स्थिति अत्यंत पवित्र स्वभाव, दोषरहित कर्म, सत्वप्रकृति और ऋतु की थी। तब दंड की आवश्यकता ही नहीं थी।
हाथी द्वारा मृत्यु दंड
किंतु कालांतर में तामस्गुणों का प्राबल्य बढ़ने लगा, मनुष्य समाज अपनी आदिम सत्व प्रकृति से च्युत हो गया और मत्स्य न्याय छा गया। बलवान् कमजोरों को खाने लगे। ऐसी स्थिति में राज्य और राजा की उत्पत्ति हुई और सबको सही रास्तों पर रखने के लिये दंड का विधान हुआ। दंड राज्य शक्ति का प्रतीक हुआ जो सारी प्रजाओं का शासक, रक्षक तथा सभी के सोते हुए जागनेवाला था। अत: दंड को ही धर्म स्वीकार किया गया। राज्य धर्मानुसार दंड की व्यवस्था सभी पर समान रुप से लागु थी, इतिहास गवाह है कि राजाओं ने भी दंड को स्वीकार कर राज्य धर्म की रक्षा की। दंड का प्रयोग करनेवाला राजा भी यदि धर्म का उल्लंघन करे तो दंड का भागी होता था। धर्म अर्थात् विधि से परे कोई न था धर्म राजाओं का भी राजा था। राज्य का प्रधान राजा अथवा अन्य कोई शक्ति, यथा गणतंत्र का मुखिया न्यायिकय संगठन का प्रधान अवश्य था, किंतु विधि का प्रधान वह कभी नहीं हो सका और विधि के उल्लंघन करने पर दंड उस पर भी सवार हो जाता था। 
दंड के लिए हाथी को उकसाते हुए
दंड चार तरह के माने गए, 1- प्रतीकारात्मक - समाज की अत्यंत प्रारंभिक अवस्था प्रतीकारात्मक दंड की थी, जिसमें आँख के बदले आँख और दाँत के बदले दाँत (फोड़ देने और उखाड़ देने) का सिद्धांत चलता था। वैदिक साहित्य की "जीवगृभ" जैसी संज्ञाएँ इस बात की द्योतक हें कि भारतीय इतिहास के अत्यंत प्रारंभिक काल का न्याय कठोर और प्रतीकारात्मक ही था। इस सिद्धान्त की मान्यता है कि एक अपराधी को कठोर दण्ड देने से दूसरे लोग अपराध करने से डरते हैं।

2- निषेघात्मक - निषेधात्मक सिद्धान्त की मान्यता है कि अपराधी को दण्ड देने से जिसके प्रति अपराध हुआ है उसे उसका 'बदला' मिल जाता है। यह सभी सिद्धान्तों में सबसे बुरा सिद्धान्त है क्योंकि इसमें समाज का कल्याण या समाज की सुरक्षा की भावना नहीं है। 

3-अवरोधक -तीसरी अवस्था में दंड का स्वरूप प्रतीकारात्मक के बदले अवरोधक हो गया। इसका कारण था दोषी मनुष्य के प्रति दोष किए गए हुए मनुष्य का निपट लेने के बजाय दंड धारण करनेवाले राज्य का बीच में आ जाना। व्यक्तिगत बदले की भावना को समाप्त कर राजकीय दंड की महिमा को स्थापित करना राज्य का उद्देश्य और उसकी बढ़ती हुई शक्ति का द्योतक हो गया। दीवानी के मामलों में अर्थदंड आदि द्वारा दोष किए गए हुए व्यक्ति को कुछ बदला दिलाना यद्यपि वैध माना गया, फौजदारी के मामलों में बदला लेना अब असंभव था। किंतु कठोर - कभी कभी तो अत्यंत क्रूर और असभ्य दंडों का दिया जाना प्राय: नियम सा था। 
विजयनगर राज्य का सार्वजनिक दंड स्थल 
4- सुधारात्मक - चौथा और सर्वोत्तम दंड का प्रकार है सुधारात्मक। सभ्यता के विकास के क्रम में भी यद्यपि सभी देशों में संभावित दोषियों के प्रति दोषों के गंभीर परिणाम और दंडयातनाओं का भय उपस्थित करने के लिय कठोर अवरोधक दंड दिए जाते रहे हैं, पर कभी-कभी सुधारात्मक प्रवृत्तियाँ भी उठती रही हैं। प्राचीन रोम में दोषी की स्वतंत्रता का हरण (जेल में डाल देना) मात्र ही सबसे बड़ा दंड माना गया और उसके बाद कोई यातना आवश्यक नहीं समझी गई । भारतवर्ष में कौटिल्य ने काराग्रस्तों को प्रायश्चित्त कराने और अपने पापों का बोध कराने की व्यवस्था के द्वारा उन्हें विशुद्ध कराने का उल्लेख  किया है।
विजयनगर राज्य के सार्वजनिक दंड स्थल पर ब्लॉगर
आज दंड विधान की चर्चा करने का उद्देश्य था कि हम्पी यात्रा के दौरान प्राचीन विजयनगर राज्य में भी दंड की व्यवस्था के प्रमाण दिखाई देते हैं, जहाँ कारागार में निरुद्ध करने एवं सार्वजनिक रुप से दंड देने की प्रथा दिखाई देती है। राजमहल के लगे हुए दशहरा उत्सव स्थल के समीप सार्वजनिक रुप से दंड देने के लिए मुख्य मार्ग पर दो स्तंभ गड़े दिखाई देते हैं। इन स्तंभों के छिद्रों में लकड़ी डालकर अपराधी को हाथों से उसमें बांध दिया जाता था। यहाँ उसे प्रजा की उपस्थिति में सार्वजनिक रुप से दंड दिया जाता था। यह दंड सार्वजनिक रुप से कोड़े मारने से लेकर शीश विच्छेद तक का हो सकता था। किसी भी राज्य के संचालन के लिए साम, दाम, दंड एवं भेद की प्राचीन पद्धति लागु होती है। क्रूरतम अपराधी एवं राजद्रोही को कठोर दंड का विधान था।




पत्थर के दरवाजे एवं खराद का प्राचीन कार्य : दक्षिण यात्रा 14

म्पी यात्रा कई मायनों में सार्थक रही, कुछ ऐसी चीजें देखने मिली जो अन्य स्थानों पर दिखाई नहीं देती। विजयनगर साम्राज्य का वैभव एवं उसके भवनों की भव्यता आज भी दिखाई देती है और पर्यटक को विस्मित कर देती है। यहां के निर्माणों को देखकर उसे सोचना पड़ता है कि इसका निर्माण मनुष्यों द्वारा ही किया गया है या किसी अन्य ग्रह के प्राणियों द्वारा। वैसे भी वर्तमान में डिस्कवरी चैनल पर तो इस तरह के निर्माणों को सीधे-सीधे ही परग्रहियों द्वारा निर्मित करार दे दिया जाता है और मनुष्य के कार्यों पर प्रश्न चिन्ह लगा दिया जाता है।
हम्पी स्थित प्रस्तर द्वार
हम्पी का राजनिवास 59000 मीटर के क्षेत्र में फ़ैला हुआ है, यह विजयनगर का पुरातन हिस्सा है, जिसमें हरिहर बुक्का से लेकर राजा कृष्ण देव राय द्वारा निर्मित भवनों का जखीरा है। यह एक आहते से घिरा हुआ जिसमें तैतालिस भवन हैं। यह क्षेत्र ऊंची दोहरी दीवारों से घिरा हुआ है। आहते में तीन प्रवेश द्वार हैं, दो द्वार उत्तर एवं एक द्वार पश्चिम में। यहीं से आहते में प्रवेश के लिए मुख्यद्वार है तथा इसके समीप ही नवरात्रि एवं दशहरा उत्सव मनाने के लिए विशाल मंच बनाया गया है जिसे "महानवमी डिब्बा" कहते हैं। इस मंच पर ही उत्सव के कार्यक्रम होते थे। 
हम्पी स्थित प्रस्तर द्वार
इसके समीप ही कड़प्पा पत्थर से निर्मित दो किवाड़ रखे हुए हैं। इनकी ऊंचाई लगभग 13 फ़ुट एवं चौड़ाई साढे तीन फ़ुट (बंद होने पर लगभग सात फ़ुट) होगी। ये दरवाजे बेड़ीदार बने हुए हैं। आज भी छत्तीसगढ़ अंचल में बबूल की लकड़ी के इस तरह के किवाड़ों (नौबेड़िया) का ग्रामीण अंचल में बहुतायत से उपयोग होता है। इस पत्थर के किवाड़ों का निर्माण शिल्पकार ने बड़ी कुशलता से किया है। दूर से देखने से प्रतीत नहीं होता कि ये किवाड़ पत्थर के होगें। लकड़ी द्वारा निर्मित किवाड़ो की सभी बारीकियों को कील समेत कुशलता से उकेरा गया है। चौखट में स्थापित करने के लिए इनमें नीचे तरफ़ मोटी कील बनाई गई हैं तथा पीछे की तरफ़ बंद करने के लिए अर्गल लगाने के छेद भी बनाए गए हैं।
हम्पी स्थित प्रस्तर द्वार
कहते हैं कि इस किवाड़ों का उपयोग आहते में प्रवेश करने वाले मुख्यद्वार में किया गया था। इसको खोलने एवं बंद करने के लिए हाथियों का उपयोग किया जाता था। इसे खोलना एवं बंद करना आदमी के बस की बात नहीं थी। परन्तु इन किवाड़ों के अवलोकन के पश्चात मुझे नहीं लगा कि कभी इनका उपयोग किया गया होगा। क्योंकि किवाड़ों में बनी धूरी (कील) में चिकनाई नहीं थी। वह वैसी ही खुरदरी हैं जैसी निर्माण के समय होगी। अगर इन किवाड़ों का उपयोग किया गया होता तो इनकी धूरी खोलने एवं बंद करने के घर्षण के कारण चिकनी होती। जब यह जानने के लिए मैंने धूरी का स्पर्श किया तो बस मुझे यही बात खटक गई थी। हो सकता है इन किवाड़ों का उपयोग छद्म द्वार के रुप में या दिखावटी द्वार के रुप में किया गया हो।
लेथ (खराद) मशीन में निर्मित होता स्तंभ
राजाओं नें हम्पी में जो निर्माण कार्य किए उसको देखकर देशी-विदेशी चकित रह जाते हैं। विशालकाय एकाश्म शिलाओं की प्रतिमाओं के साथ भव्य मंदिरों एवं भवनों का भी निर्माण हुआ। मंदिरों के निर्माण में विशेषता दिखाई देती है। कई मंदिरों के स्तंभ गोलाकार एवं खरादे हुए हैं। इन स्तभों का निर्माण काले कणाश्म (कड़प्पा) पाषाणों से हुआ है। इन स्तंभों को देख कर मैं सोच रहा था कि इनका निर्माण कैसे किया गया होगा?
लेथ (खराद) मशीन एवं उसपे निर्माण कार्य
हम्पी भ्रमण के दौरान मुझे इसके प्रमाण अनायास ही मिल गए, ढूंढने के लिए अधिक श्रम नहीं करना पड़ा। दशहरा उत्सव स्थल के समीप मुख्य मार्ग पर अपराधियों को सजा देने के लिए लगाए गए स्तंभों के मध्यम में दो पत्थर रखे हुए हैं, जिन पर खराद (लेथ) करने के चिन्ह दिखाई दे रहे थे। इन्हें देखने के पता चलता है कि लगभग 15 फ़ुट लम्बाई एवं 3X3 फ़ुट के प्रस्तरों का वजन सहने लायक वह कौन सी खराद मशीन होगी, जिस पर इन स्तंभों को तराशा गया होगा और उसके संचालन के लिए कौन सी उर्जा का उपयोग किया गया होगा?
हम्पी के राजमार्ग पर स्तम्भ अवसेष
भारत में लोहे की खोज बहुत पहले हो गई थी। लोहे से इस्पात भी बनाया जाने लगा था। दक्षिण की दमिश्त तलवारें विश्व प्रसिद्ध थी, उनकी धार एवं मजबूती का लोहा दुनिया मानती थी और यहाँ से उनका निर्यात भी बड़ी मात्रा में होता था। खराद मशीन के निर्माण के लिए इसी लोहे का प्रयोग किया गया होगा तथा चक्र की योजना से खराद बना कर इन स्तभों को कुशल कारीगरों द्वारा तराशा गया होगा। वर्तमान में कणाश्म (ग्रेनाईट) पाषाण को काटने के लिए डायमंड कटर का उपयोग किया जाता है, तब कहीं जाकर यह कठोर पाषाण कटता है। 
लेथ से खरादे गए स्तंभ हम्पी
पन्द्रहवीं शताब्दी में कारीगरों ने ग्रेनाईट काटने के लिए मजबूत लोहे के औजार बनाए और उनसे इन पत्थरों को तराशा। यह उस काल की आश्चर्यचकित करने वाली उत्तम तकनीक थी। विशाल चट्टानों को मशीन पर रज्जु चक्र यंत्र (चैन कुप्पी) की मदद से स्थापित किया जाता होगा और उसका सेंटर लेकर मशीन में बांधा जाता होगा। पन्द्रहवीं सदी में विद्युत का अविष्कार नहीं हुआ था इसलिए मशीन को चलाने के लिए पशुबल का उपयोग किया जाता था। जिस तरह तेल निकालने की मशीन या रहट चलाने के लिए चक्रों का प्रयोग किया जाता था उसी प्रकार इस मशीन को चलाने के लिए चक्रों का प्रयोग किया गया होगा एवं पशुओं के बल से मशीन संचालित होती होगी।
वृषभ शक्ति से चलित जयगढ़ राजस्थान की प्राचीन लेथ (खराद)
इस मशीन का जीवंत उदाहरण हमें राजस्थान के जयपुर के जयगढ़ दुर्ग 1726 ईं में दिखाई देता है। यहाँ विश्व की सबसे बड़ी तोप "जय बाण" का निर्माण हुआ था। दुर्ग के भीतर तोप बनाने का कारखाना है, जिसमें तोप की ढलाई के बाद उसे वास्तविक रुप देने एवं उसमें छेद करने के लिए पशु संचालित खराद मशीन का उपयोग किया गया था। यह मशीन बैलों से चलती थी। इसे आज भी सुरक्षित रखा गया है। मशीन संचालन की प्रणाली जानने के लिए यह एक अच्छा उदाहरण है। कई वर्षों पहले मैने इस मशीन को देखा था और इसकी संचालन की प्रणाली को समझा था। लकड़ी, लोहे तथा पत्थर को तराशने के लिए खराद मशीन का अविष्कार निर्माण कार्य में क्रांतिकारी परिवर्तन लाया होगा।

रामायणकालीन किष्किन्धा (हम्पी) एवं उसकी जलप्रबंधन प्रणाली : दक्षिण यात्रा 15

आरम्भ से पढ़ें
हम्पी के विषय में मान्यता है कि यह रामायण काल का वानर राज्य किष्किन्धा है। शायद इसकी वजह यहाँ के वानर रहे होगें। हम जानते हैं कि हम्पी मंदिरों का शहर है, पम्पा का अपभ्रंश हम्पी नाम है। पम्पा तुंगभद्रा नदी का पुराना नाम है। हम्पी इसी नदी के किनारे बसा हुआ है। हम्पी से पहले एनेगुंदी विजयनगर की राजधानी हुआ करती थी। हम्पी को राजधानी बनाने के पीछे मूल कारण यहाँ की भौगौलिक संरचना है। चारों तरफ़ पहाड़ी से घिरे होने के कारण सुरक्षा की दृष्टि से इसे बसाया गया तथा राजधानी के लिए जल उपलब्ध कराने के लिए तुंगभद्रा नदी भी थी। मनुष्य को जीवन रक्षा के लिए जल की आवश्यकता होती है, जहाँ प्रचूर मात्रा में जल उपलब्ध हो और सामरिक दृष्टि से सुरक्षित हो ऐसे स्थान पर ही राजधानी बनाई जाती थी।
हम्पी नगर का माडल जिसके माध्यम से जलापुर्ति प्रबंध को बताया गया है।
हम्पी बहुत बड़ा नगर है, कल्पना से भी बड़ा। इसकी तुलना रोम से की जा सकती है। भवनों एवं मंदिरों का नगर है यह। विशाल क्षेत्र में जल पहुंचाने के लिए जल प्रबंधन प्रणाली का विकास बहुत ही नायाब तरीके से किया गया है। यहाँ का जल प्रबंधन तत्कालीन अभियांत्रिकी बड़ी मिशाल है। कर्नाटक की सबसे बड़ी नदी तुंगभद्रा इसी भूभाग से बहती है और इस भूभाग की संरचना ऐसी है कि बहती हुई नदी अचानक अपनी ऊंचाई खोकर नीचे की ओर आती है, परिणामतः यह अत्यधिक गति पकड़ लेती है और प्रचंड वेग से बहती है। बस इसी वेग का सदूपयोग यहाँ की जटिल जल प्रणाली को संचालित करने के लिए किया गय।
प्रणालिकाओं के माध्यम से तुंगभद्रा नदी जल वितरण प्रबंध

पत्थर की नालियाँ बनाकर शाही इलाके में जल लाया गया। नदी के वेग का उपयोग कर मुख्य प्रणालिका द्वारा जल शहर में आता था तथा उसके पश्चात अन्य लघु प्रणालिकाओं द्वारा इसे विभाजित कर अन्य स्थानों पर भेजा जाता था। विरुपाक्ष मंदिर में विशाल पाकशाला है। एक समय में यहाँ हजारों लोगों के लिए भोजन प्रसाद की व्यवस्था होती थी, तुंगभद्रा नदी का शीतल जल प्रणालिकाओं के माध्यम में पाकशाला में निरंतर वर्तमान में भी प्रवाहित हो रहा है। पाकशाला में जल की व्यवस्था करने के लिए किसी कुंए या बावड़ी पर निर्भर नहीं रहना पड़ता।
विरुपाक्ष मंदिर के भोजनालय में प्रणालिका के माध्यम से तुंगभद्रा से सतत जलापूर्ति
प्रणालिकाओं से नदी का जल शहर में लाकर उसे लघु प्रणालिकाओं द्वारा विभाजित कर पुष्करी को भी भरा जाता था। शाही आवास क्षेत्र में काले कड़प्पा पत्थर से निर्मित एक सुंदर पुष्करी है, जिसे नदी के जल से भरने की व्यवस्था की गई है। इसके बाद आवास क्षेत्र के मध्य में एक कुंआ है जिसे नदी के जल से भर दिया जाता था। उसके पश्चात कुंए के जल का उपयोग किया जाता था। कुंए से जल निकाल कर प्रणालिकाओं के माध्यम से आगे बढा दिया जाता था। इससे राज निवास, सैनिक छावनी, महानवमी दिब्बा, अंत:पुर एवं अन्य आवासों तक समुचित व्यवस्था की जाती थी। 
की होल कूप हम्पी
शाही आवास के मध्य में मुख्य मार्ग के समीप घुड़साल है, जहाँ आगंतुक अपने अश्वों को बांध कर विश्राम देते थे। यहाँ पर लगभग 40 फ़ुट लम्बे एकाश्म पत्थर की नांद (खेळ) रखी हुई है, जिसका उपयोग पशुओं की प्यास बुझाने के लिए किया जाता था। हम्पी नगर में एक शानदार तकनीक का उपयोग कर जल प्रबंधन किया गया है। यहाँ राजधानी का निर्माण करना तुलुवा वंश के शासकों के लिए दूर दृष्टि का परिचायक था। विजय नगर साम्राज्य सारे दक्षिण में छा गया और एक सुदृढ़ राज्य बना, भले की कालखंड पृथक हो परन्तु मगध से कम करके नहीं आँका जा सकता

हम्पी के रनिवास का कमल महल एवं सुरक्षा प्रबंध : दक्षिण यात्र 16

किसी भी राज्य का सबसे सुरक्षित एवं संरक्षित स्थल रनिवास या जनानखाना हुआ करता था। ऐसा ही विजयनगर साम्राज्य में भी था। लगभग पचीस फ़ुट ऊंची पत्थर की दीवारों से घिरा हुआ जनानखाना यहां भी है। इसे किसी गढ़ के सदृश सुरक्षित बनाया गया है। 
जनानखाना हम्पी का प्रवेश द्वार
जनानखाना की सुरक्षा एवं आठों पहर निगरानी की के लिए वाच टावर बनाया हुआ है। जिस पर चढ कर दूर तक देखा जा सकता है। जनानखाना परिसर काफ़ी बड़ा है, इसमें रानी महल एवं कमल महल प्रसिद्ध है। इसके के समीप ही कोषागार स्थित है तथा कमल महल के पीछे हाथी खाना भी है। जहाँ राजकीय हाथी रखे जाते थे।

जनानखाना हम्पी में कमल महल का द्वितलीय भवन
जनानखाना में प्रवेश के लिए छोटा सा द्वार है। यहां प्रवेश शुल्क लिया जाता है। रानी महल का सिर्फ़ अधिष्ठान ही दिखाई देता है। बाकी भवन तो नष्ट हो चुका है। जनानखाना में महिलाओं के उत्सव मनाए जाते थे तथा यह राजपरिवार की महिलाओं के ग्रीष्मकालीन निवास के रुप में भी प्रयुक्त होता था।
कमल महल एवं सुरक्षा स्तंभ
यहां आमोद प्रमोद के साधन भी उपलब्ध कराए जाते थे। जिससे जनानखाना की महिलाओं का मनोरंजन होता रहे। जनानखाने में दर्शनीय सिर्फ़ कमल महल ही है। यही भवन बचा हुआ है, वरना सभी नष्ट हो गए। भारतीय एवं इस्लामिक शैली के मिश्रण निर्मित किया गया है।
प्रस्तर परकोटे से घिरा हुआ कमल महल
कमल महल को वास्तुकार ने ग्रीष्मकालीन भवन के रुप में निर्मित किया है। इसकी भित्तियों में सिरेमिक की नालियां बनाकर स्थापित की गई हैं, जिसमें सायफ़न पद्धति से जल प्रवाह बनता था और भवन ग्रीष्मकाल में शीतल रहता था। यह दुमंजिला भवन है। इसकी छत का निर्माण मेहराबों पर हुआ है। 
रानी महल के अवशेष एवं वाच टावर
भवन के निर्माण में ईंटों एवं चूने सुर्खी का प्रयोग किया गया है। द्वारों पर पुष्प वल्लरियों का सुंदर अलंकरण किया गया है। इन द्वारों के इस हिसाब से बनाया गया कि निरंतर वायु का प्रवाह बना रहे। जिससे भवन गर्म न हो। इस भवन की छत कमल की पंखुड़ियों जैसे निर्मित की गई हैं, इसलिए इसे कमल महल कहा जाता है।
कमल महल का वातानुकूलन प्रबंध
इस भवन में एक विशिष्टता मुझे यह दिखाई दी कि इन्डो इस्लामिक शैली में निर्मित होने के बाद भी इसके द्वार शीर्ष पर कीर्तिमुख का अंकन किया गया है। कीर्तिमुख के निर्माण का विधान सिर्फ़ शिवालयों में ही दिखाई देता था। कीर्तिमुख शिवगण है तथा शिव से वरदान प्राप्त  होने के पश्चात ही इसे मंदिरों की भित्ति में स्थान मिला। हो सकता है कि इस भवन का उपयोग रनिवास में धार्मिक कर्मकाण्डों एवं उत्सवों के लिए किया जाता रहा होगा, क्योंकि निवास भवनों में कीर्तिमुख अलंकरण का विधान नहीं है। जहाँ देव स्थापित हो वहीं कीर्तिमुख रहते हैं।
कमल महल के द्वार शीर्ष पर कीर्तिमुख अलंकरण
हम्पी सम्पन्न राज्य था, यहां की सड़कों पर बेशकीमती पत्थरों की दुकाने लगा करती थी। देश विदेश से व्यापारी अपनी श्रेष्ठतम वस्तुएं यहां विक्रय के लिए प्रदर्शित करते थे। जिस तरह मुगलों के समय में रनिवास में मीना बाजार लगाया जाता था उसी तरह यहां के रनिवास में मीना बाजार लगाया जाता रहा होगा। जिससे जनानखाने के लिए स्त्रियां अपनी पसंद का सामान खरीद सकें।

कमल महल का वातानुकूलन प्रबंध
हम्पी में धन और वैभव की कोई कमी नहीं थी। विट्ठल मंदिर एवं महानवमी दिब्बा की भित्तियों पर विदेशी व्यापारियों को प्रदर्शित किया है। इससे तय है कि यहां विदेशी व्यापारियों की पहुच हम्पी तक थी। बेशकीमती सामान एवं राज परिसर की स्त्रियों की सुरक्षा के लिए जनानखाने को सुरक्षित निर्मित किया गया है। 

द्रविड़ शिल्पकला उत्कृष्ट हजार राम मंदिर : दक्षिण यात्रा 17


निवास से हम हम्पी के शाही आवासीय परिसर के प्रवेश द्वार पर स्थित हजार राम मंदिर पहुंच गए। पन्द्रहवीं सदी में कड़प्पा प्रस्तर से निर्मित यह राजा का निज मंदिर है, इस मंदिर में राजपरिवार द्वारा पूजा की जाती थी। यह जनाना आवास के समीप ही है।  कहा जाता है कि इसका निर्माण राजा कृष्णदेव राय ने अपने कार्यकाल में करवाया था।
हजार राम मंदिर का मुख्य मंडप
इसके सामने सुपारी बाजार है और मंदिर के गर्भगृह से समक्ष स्थापित गरुड़ स्तंभ दिखाई देता है। शाही आवासीय परिसर में स्थित इस मंदिर की शिल्पकला देखने लायक है। रामायण के कथानकों को भित्तियों में स्थान दिया गया है, रामकथा के हजार प्रसंगों का शिल्पाकंन करने के कारण इसे हजारराम मंदिर नाम दिया गया।
हजार राम मंदिर का महामंडप  एवं गर्भ गृह

मंदिर के गर्भगृह में वर्तमान में कोई प्रतिमा स्थापित नहीं है। मुख्य मंडप में काले ग्रेनाईट के चार अलंकृत स्तंभों का प्रयोग किया गया है। इन्हे पॉलिश करके चिकना किया गया है। इन स्तभों पर राम सीता, विष्णु, उमा महेश्वर, मुरलीधर एवं अन्य देवी देवताओं को स्थान दिया गया है। 
महामंडप के अलंकृत स्तंभ एवं गर्भगृह
मुख्य मंडप का वितान चतुष्कोणीय जिसमें सुंदर पद्मांकन किया गया है। मंदिर के मुख्यद्वार के शिलापट पर गजाभिषिक्त लक्ष्मी का अंकन है। मंदिर की बाहरी एवं भीतरी भित्तियों पर प्रचूर मात्रा में रामायण के कथानकों के साथ अन्य देवी देवताओं को भी स्थान दिया गया है। मुख्यद्वार पर एक तरफ़ महिषसुर मर्दनी एवं दूसरी तरफ़ भैरव की प्रतिमा बनाई गई है।
हजाराराम मन्दिर के द्वार पर भैरव अंकन
भगवान विष्णु को समर्पित यह भव्य मंदिर है,  इसका निर्माण राजपरिवार के धार्मिक अनुष्ठानों के लिए किया गया था। विशेष पर्वों पर आमजनता को भी इस मंदिर में दर्शन की अनुमति दी जाती रही होगी। यह मंदिर द्रविड़ शिल्पकला का अनुपम उदाहरण है। 
हजाराराम मन्दिर के द्वार पर महिषासुर मर्दनी अंकन
इसकी योजना में एक गर्भगृह, एक अंतराल, एक मुख मंडप तथा उत्तर-दक्षिण में अर्ध मंडप निर्मित हैं। पुर्व दिशा में विस्तारित सुंदर महा मंडप है। मंदिर की उत्तर दिशा में देवी का अलंकृत मंदिर भी है। हजारराम मंदिर अपने पॉलिश किए गए स्तंभों के कारण अलग पहचाना जाता है।
हजाराराम मंदिर की भित्ति पर रामायण के प्रसंगो का प्रदर्शन
भित्तियों पर अंकित प्रतिमाओं के मैने कुछ चित्र लिए, समय इतना नहीं था कि पूरी रामायण को अपने कैमरे में कैद कर सकूं। कुछ शिल्पांकन रामायण से हट कर भी दिखाई देता है, एक स्थान पर मुझे विष कन्याओं का शिल्पांकन भी दिखाई दिया। जो हाथ में फ़णीधर नाग लेकर उससे खेलती हुई दिखाई दे रही हैं। 
हजाराराम मन्दिर की भित्ति पर विष कन्या का अंकन
इसके साथ  ही सैनिक दल, आखेट, नृत्यांगनाओं एवं अन्य राजकीय गतिविधियों को भी दर्शाया गया है। हम्पी के सन्य मंदिरों की तरह इस मंदिर की छत से उपर का निर्माण ईंटों से किया गया है तथा सूर्खी एवं चूने की सहायता से प्रतिमाओं का निर्माण भी किया गया है, जो अभी क्षरित हो रही हैं। 
रामायण के प्रसंग में राजा दशरथ तीनो रानियों को यज्ञ शेष खीर का वितरण करते हुए
जिस तरह उत्तर भारत के मंदिरों में प्रत्येक मंदिर में मिथुन शिल्प को भी स्थान दिया गया है, वहीं हम्पी के मंदिरों में मिथुन प्रतिमाओं का लगभग अभाव ही है, अन्य किसी मंदिर में मुझे मिथुन प्रतिमाएं दिखाई नहीं दी। सिर्फ़ हजार राम मंदिर में अपवाद स्वरुप एक मिथुन भित्ति प्रतिमा दिखाई देती है। 
हजारराम मंदिर का इकलौता मिथुनांकन
शायद इस काल में मंदिरों में मिथुन प्रतिमाओं का अंकन कम हो गया होगा या मिथुन प्रतिमाओं के सार्वजनिक प्रदर्शन से बचा जाता होगा। कुछ भी हो सकता है, परन्तु एक मिथुन प्रतिमा का मिलना अपवाद ही माना जा सकता है। कुल मिलाकर हजार राम मंदिर द्वविड़ शिल्पकला का उत्कृष्ट प्रदर्शन करता है।

हम्पी की यादें लिए तेनाली राम के साथ लेपाक्षी ओर: दक्षिण यात्रा 1

प्राचीन हम्पी नगर पचीस किमी के दायरे में फ़ैला हुआ है, इसके सभी स्मारक देखने के लिए कई दिनों का समय चाहिए। हमारे पास गाड़ी थी, ठहरने खाने की व्यवस्था थी, पर समय नहीं था। इसलिए इस यात्रा को अधूरी छोड़कर ही जाना था। यहां कृष्ण मंदिर, अच्यूतानारायण मंदिर, माता मंदिर, जैन मंदिर, यल्लमा मंदिर आदि कई स्मारक हैं, जिन्हें हम नहीं देख सके। चलते चलते हमने यहाँ का पुरातत्विक संग्रहालय अवश्य देखा। यहां हम्पी से प्राप्त प्रतिमाएं रखी हुई हैं। गंगाधर को नगर के चौराहे पर छोड़ते हुए हम 11 मार्च को सुबह साढे दस बजे बेल्लारी की ओर चल दिए। फ़िर इतनी कम अवधि में हमने गुनने लायक तो हम्पी देख लिया था। 
राज कृष्ण देव राय अपनी दोनो पत्नियों चिन्ना देवी एवं तिरुमल देवी संग
विजयनगर साम्राज्य की बात हो और तेनाली राम का जिक्र न आए तो यह बहुत ना इंसाफ़ी होगी। तेनाली राम के किस्से बचपन  में पढकर बड़े हुए। वह एक चतुर व्यक्ति था, जो समस्याओं का समाधान चुटकियों में निकाल लेता था। जिस तरह अकबर ने अपने दरबार में नव रत्न नियुक्त किए थे, उसी तरफ़ राजा कृष्णदेव राय ने अपने अपने दरबार में अष्टदिग्गज नियुक्त कर रखे थे। इन्ही में से एक दिग्गज तेनाली राम था। तेनाली राम का कार्यकाल 1509 से 1529 ईस्वीं तक बताया जाता है। वह अपने बीस वर्ष के कार्यकाल में  ही इतना प्रसिद्ध हो गया कि उसे पाँच सौ वर्षों के बाद आज भी याद किया जा रहा है। 

तेनाली राम जन्म से शैव था, लेकिन बाद में उसने वैष्णव धर्म अपना लिया और अपना नाम  रामकृष्ण कर दिया।  शैव और वैष्णव उस समय में हिन्दू धर्म के दो विपरीत विपरीत संप्रदाय थे। इसका जन्म 16 वी सदी के आरम्भ में तेलगु ब्राह्मण परिवार में हुआ था।  ऐसा माना जाता है कि उनका जन्म आंध्र प्रदेश के गुंटूर जिले के एक तेनाली नामक एक नगर में हुआ था।  तेनाली के पिताजी गरलाप्रति रमय्या तेनाली नगर के रामालिंगेश्वर स्वामी मन्दिर में पुजारी थे।  उसके पिता की मौत के बाद तेनाली राम को उसके चाचा ने पाला था | उसके जाति के धार्मिक रीती रिवाजो के कारण उन्हें शिक्षा नही दी गई।

तेनाली राम “भगवत मेला” नाम के एक प्रसिद्ध मंडली के साथ विजयनगर पहुचे।  उसके प्रदर्शन से प्रसन्न होकर कृष्णदेवराय ने उसे अपने दरबार में हास्य कवि के रूप में रख लिया और बाद में वो अष्टदिग्गज में शामिल हो गये। ऐसा माना जाता है कि तेनाली राम ने अपनी बुद्धि और रणनीति से समय समय पर विजयनगर साम्राज्य को दिल्ली सल्तनत से बचाया था। बुद्धिमता के मामले में तेनाली राम की बीरबल से तुलना कर सकते है परन्तु बीरबल की तरह तेनाली राम धनवान नही था। 

तेनालीराम के चरित्र की यह खासियत थी कि वो कभी भी बड़े से बड़े शत्रु के आगे हारा या झुका नही। हमेशा उसके पास एक ऐसा छिपा हुआ दांव रहता था, जिससे विरोधियो के छक्के छुट जाते थे। इसके अलावा तेनालीराम के पास जनता के विश्वास का सबसे बड़ा बल था। वो हर बार राजा कृष्णदेव राय को हवाई बातो से बचाकर अपनी जमीन और जनता के दुःख दर्द से जुड़े रहने को प्रेरित करता था।  इसके लिए वो हास्य का भरपूर इस्तेमाल करता था। 

तेनालीरामा अपने समय का सबसे बुद्धिमान व्यक्ति था, जिसका हमेशा अपने समय , समाज और प्रजा के हालात की नब्ज पर हाथ रहता था। तेनाली राम के काव्य पांडूरंगा महात्यम को तेलुगु साहित्य के पांच महान काव्यो में एक गिना जाता है। तेनाली राम के जीवन पर तेलगु और तमिल भाषा में नाटक भी रचे गये। तेनाली राम के किस्से भारत के सभी भाषा भाषियों की जुबान पर है। उसके किस्सों का भारत की विभिन्न भाषाओं में अनुवाद हुआ और बच्चों को उसके चतुराई भरे किस्से बड़े रोचक लगते हैं। 

डोन्ट वरी, बी हंपी..!!

नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकुटुंब हंपी दर्शन झाले. ६ दिवसांची सहल होती. त्यातील ३ दिवस हम्पीसाठी होते (हंपी साठी तीनच दिवस दिले याचा खूप पश्चाताप होत आहे). उर्वरित ३ दिवस बदामी, पट्टदक्कल, ऐहोळे, कुडल संगम असा प्रवास केला.
रामायणातील काही प्रसंग इथे घडले आहेत. प्रभू रामचंद्रांचा सहवास या क्षेत्रास लाभला असला तरी, हंपी ओळखली जाते ती सम्राट कृष्णदेवरायामुळे. मौर्य, चालुक्य, होयसळ, काकतीय, संगम इ. अनेक राजघराण्यांनी इथे राज्य केले, पण देवरायाच्या कालखंडात या शहराने जे वैभव अनुभवलं असेल ते खचितच इतर कोणताही राजा करू शकला नसता.

विजय नगर जिल्ह्यामध्ये असलेले हम्पी हे होस्पेट पासून १५ किमी लांब आहे. हम्पी मध्ये राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स आहेत, परंतु के. एस. टी. डी. सी. चे हॉटेल्स उत्तम पर्याय आहेत. खुद्द हंपी मध्ये देखील के. एस. टी. डी. सी चे हॉटेल आहे परंतु आम्हाला तेथील बुकींग मिळाले नसल्यामुळे होस्पेटमधील ‘मयुरा विजयानगरा’ या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. हॉटेलच्या रूम्स प्रशस्त, हवेशीर आणि आरामदायी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक रूमच्या दर्शनीय भिंतीवर हम्पी मधील ऐतिहासिक स्मारकांचे वॉलपेपर त्या रूमची शोभा वाढवतात.

हॉटेलमधील खोली
हॉटेलमधील खोली

या हॉटेलपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर तुंगभद्रा धरण आहे. हॉटेलचे चेक-इन दुपारी एक वाजता होते. आम्ही साधारण १२:३० वाजता हॉटेल मध्ये पोचलो होतो. सुदैवाने रूम्स रिकाम्या असल्यामुळे आम्हाला वापरता आल्या, व फ्रेश होऊन हंपीकडे जाण्यास निघालो. जाताना सुरुवातीला कमलापूर लागते. कमलापूर मधील हॉटेलमध्ये कर्नाटकी राईस प्लेट खाल्ली. चव ठीकठाक होती. भूक लागल्यामुळे चवीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. जेवण आटोपून हंपी दर्शनाला निघालो, त्यावेळेस साधारण तीन वाजले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जेवढे बघणे शक्य आहे, तेवढे बघायचे असे ठरवले.
गळ्यामध्ये सरकारी ओळख पत्र असलेले भरपूर गाईड हम्पी मध्ये आहेत. त्यातीलच एक गाईड आम्ही निवडला. सुदैवानं आमचा गाईड मराठी भाषा चांगल्या पद्धतीने बोलू आणि समजू शकत होता.
हंपीला जाताना आपले स्वागत होते ते प्रचंड शिलांपासून पासून बनलेल्या टेकड्यांनी! या शिळा लगोरी प्रमाणे एकावर एक अशा रचलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला या प्रकारच्या आवाढव्य लगोऱ्या पाहून एकदा तरी मनात असा विचार येतो की, यातील एक जरी शिळा हलली तर काय होईल!! पण हा विचार फार काळ टिकत नाही. कारण भव्य प्रस्तरांनी बनलेली हेमकूट टेकडी आपले लक्ष वेधून घेते. एका पौराणिक कथेनुसार कुबेराने या क्षेत्रावर सुवर्ण नाण्यांचा वर्षाव केला होता, म्हणून या टेकडीला हेमकूट असे म्हणतात.

हेमकूट टेकडी
हेमकूट टेकडी

या हेमकूट टेकडीवर कडलेकालू गणेशाचे मंदिर आहे. भरपूर शिल्पांकित खांब असलेला सभामंडप व गणेश मूर्ती असलेले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपातील खांबांवर विविध वाद्य वाजवणाऱ्या परदेशी कलाकारांची शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अखंड पाषाणात कोरलेली, एका दृष्टीक्षेपात न मावणारी भव्य अशी गणेश मूर्ती आहे. या मूर्तीची उंची जवळपास ४.५ मीटर इतकी आहे. हंपी वर एकेकाळी संगम घराण्याची देखील सत्ता होती. हे संगम घराणे विरुपाक्ष शिवाचे निस्सीम भक्त होते. विरूपाक्ष मंदिराकडे जाण्याचा प्राचीन मार्ग हेमकूट टेकडीवरील कडलेकालू गणेश मंदिरावरूनच जातो. संगम राजे कोणत्याही मोहीमेपूर्वी विरुपाक्षाचा आशीर्वाद घेत असत. राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह याच मार्गाने येत असे. प्रथम श्री कडलेकालू गणेशास अभिषेक करून, हेमकूट उतरून विरुपाक्ष शिवाचे दर्शन घेत असे.
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब
श्री. कडलेकालू गणेश मंदिराचे खांब

खांबांवरील काही शिल्पे
खांबांवरील काही शिल्पे

वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार
वाद्य वाजवणारे परदेशी कलाकार

.

एक वेगळीच मुद्रा
एक वेगळीच मुद्रा

मल्लयुद्ध करणारे युवक
मल्लयुद्ध करणारे युवक

बहामनी सुलतानाच्या आक्रमणाच्या खुणा हम्पी मध्ये सर्वच ठिकाणी दिसतात. या महाकाय अशा गणेश मूर्ती मध्ये सोने, हिरे अशी संपत्ती लपवली असेल असे वाटून, गणेशाच्या उदराला छेद देण्यात आला आणि त्याचा एक तुकडा वेगळा करण्यात आला. पण हा तर एक भरीव पाषाण आहे असे लक्षात आल्यानंतर चिडलेल्या सुलतानाने तेथील शिल्पांकित थांब उध्वस्त केले. पुरातत्व खात्याने दुसरा पाषाण लावून गणेशाचे छेडलेले उदर जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, परंतु खूप प्रयत्न करूनही मूळ मूर्तीचे texture त्या पाषाणाला देता आले नसल्यामुळे तो पाषाण तिथे अजूनही पडून आहे.

श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती
श्री. कडलेकालू गणेशाची मूर्ती

उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे
उदरास छेद दिलेला स्पष्ट दिसत आहे.

हेमकूट टेकडीवर काही ठिकाणी उखळासारखे खळगे आहेत. बहुदा त्या खांब रोवण्यासाठी केलेल्या खाचा असाव्यात. काही कारणाने ते काम अपूर्ण राहिलेले असावे. या टेकडीवरून विरुपाक्ष मंदिराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

टेकडीवरील खळगे
टेकडीवरील खळगे

हेमकुट टेकडीच्या डाव्या बाजूला ऋष्यमुक पर्वत तर उजव्या बाजूला मातंग पर्वत आहे.

हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत
हेमकुटावरुन दिसणारा ऋष्यमुक पर्वत

हेमकुट टेकडीवरून विरुपाक्ष मंदिरात जाण्याचा प्राचीन मार्ग बंद असल्याने टेकडीला वळसा घालून मंदिराकडे जावे लागते. जातानाच्या मार्गावर अनेक लहान-सहान मंदिराचे भग्नावशेष इतस्त: विखुरलेले दिसतात. विरुपाक्ष मंदिरास जाण्यासाठी जवळपास ४०० मीटर रस्ता पायी पार करावा लागतो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला हेमकूट टेकडी व उजव्या बाजूला प्राचीन बाजारपेठेचे अवशेष दिसतात. बाजारामधील दुकानांची रचना दुमजली आहे. सध्या फक्त या दुकानांचे खांबच शिल्लक आहेत. या बाजारात पूर्वी सोने, चांदी, हिरे यांचा व्यापार होत असे. विजयनगरच्या वैभवात या व्यापारीसंकुलाचा खूप मोठा हातभार होता. शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून बाजारपेठेची भव्यता जाणवते. आणि नकळतपणे सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्यांच्या लखलखाटात उजळलेल्या विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराचे कल्पनाचित्र डोळ्यासमोर आणून मन रोमांचित होते. अशा रोमांचित मनाने मंदिरात जाण्यासाठी आम्ही देवरायाने बांधलेल्या भल्यामोठ्या गोपुराकडे प्रस्थान केले.

विरुपाक्ष मंदिरासमोरील बाजार
.

विरुपाक्ष मंदिराची स्थापना ७व्या शतकात होयसळांनी केली . चालुक्य राजांनी मंदिरामध्ये भर घातली. १५व्या शतकामध्ये हंपी विजयनगराची राजधानी झाली आणि सम्राट कृष्णदेवरायाने मंदिरास गोपुरे व तटबंदी बांधून वैभवास आणले. मंदिरामध्ये एकूण ३ गोपुरे आहेत. त्यापैकी पूर्वाभिमुख असलेले गोपूर हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ९ मजली शिल्पांनी खचाखच भरलेल्या या गोपुराची उंची ५० मीटर इतकी आहे.

मुख्य गोपूर
.

गोपुराच्या डाव्या बाजूला ‘कालारि शिवाचे’ शिल्प आहे. मार्कंडेय मुनींचे प्राण हरण करण्यासाठी कालपुरुष आला असता, त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी शंकराने कालपुरुषाशी युद्ध केले व त्यास हरवले अशी कथा या २ फूट लांबीच्या शिल्पामध्ये मांडली आहे. देवरायाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गोपूर शैलीस त्याच्या नावावरून ‘रायगोपुरे’ असे म्हणतात. दक्षिण भारतामध्ये हमखास अशी गोपुरे आढळतात.

कालारि शिव शिल्प
.

गोपुरातून आत गेल्यावर डाव्या बाजूस त्रिकाळदर्शनाचे प्रतिक असलेला त्रिमुख नंदी आहे. व उजव्या बाजूला एका भिंतीवर विजयनगराचे ध्वजचिन्ह आहे. या ध्वजावर चंद्र, सुर्य, वराह व उलटा खंजीर आहे. चंद्र सुर्य हे काळाचे प्रतिक आहे, वराह विष्णूचे व खंजीर विजयाचे प्रतिक आहे. ‘ विष्णूच्या कृपेने आचंद्र्सुर्य आम्ही विजय मिळवत राहू’ असा या ध्वजाचा अर्थ.

ध्वजचिन्ह
.

.

ध्वजा शेजारीच कृष्णदेव रायाचा जुन्या कन्नड लिपीतील शिलालेख आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या मंदिराच्या चारही बाजूनी भरपूर ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामध्ये सतत धार्मिक कार्य चालू असते.अग्नेयेकडे मुद्पाकखाना आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ व बलीस्तंभ आहे. नंदिमंडप , सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहामध्ये प्रसन्न विरुपाक्ष विराजमान आहेत. या शिवलिंगाची दैनंदिन पूजा होत असते. दीपावली दरम्यान तिकडे नुकताच दीपोत्सवही साजरा झाला होता.
.

दीपस्तंभ व बलीस्तंभ
.

रंगमंडपामध्ये रंगीत भित्तीचित्रे आहे. यामध्ये शिव पार्वती विवाह, राजाचे युद्ध, अर्जुनाचा मत्स्यभेद अशी चित्रे चितारली आहेत. या चित्रांनी अशी काही मोहिनी घातली होती कि त्यांचे फोटो घेण्याचे भान सुद्धा राहिले नाही.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिव पूजनाचा महिमा कोरला आहे. यामध्ये सर्व योनीतील सजीव शंकराची उपासना करत आहेत असे दाखवले आहे. या शिल्पामध्ये कन्नाप्पा नयनार चे देखील शिल्प आहे. कन्नप्पा नयनार हा निस्सीम शिवभक्त होता. तो रोज सरोवरातून ताजी कमलफुले शंकरास अर्पण करत असे. एकदा त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने त्याला कमल फुलांच्या ऐवजी नेत्रकमळ वाहण्यास सांगितले. कन्नप्पाने किंचितही विचार न करता कट्यारीने एक डोळा काढला व शिवलिंगास लावला. दुसरा डोळा काढल्यानंतर अंध झाल्याने तो योग्य ठिकाणी लावता येणार नाही असे पाहून त्याने खुणेसाठी आपला एक पाय शिवलिंगावर ठेवला. आणि दुसरा डोळा काढणार इतक्यात शंकर प्रकट झाले व त्यांनी प्रसन्न होऊन कान्नप्पास डोळे देऊन आशीर्वाद दिला.

.

या भित्तीशिल्पाच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला दक्षिणेकडे काही परिवार देवतांची मंदिरे आहेत व एक पुष्करणी तलाव आहे. याच बाजूला ७ ते ८ पायर्यांचा एक दगडी जीना आहे. हा जीना वर चढून गेल्यावर एक अंधारी खोली आहे. या खोलीच्या एका भिंतीवर फुटभर लांबीचा एक झरोका आहे आणि त्यासमोरील भिंत पांढऱ्या रंगाने रंगवली आहे. या भिंतीवर झरोक्यामधून मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुराची उलटी प्रतिमा दिसते. एका फुटभर झरोक्यामधून ५० मीटर उंच गोपुराची संपूर्ण उलटी प्रतिमा पडण्याचे तंत्रज्ञान अचंबित करणारे आहे. (वैज्ञानिक भाषेमध्ये या तंत्रज्ञानास पिन होल कॅमेरा तंत्र म्हणतात.)

.

अशा वास्तू बांधणारे स्थपती हे मनुष्य नसतीलच असे वाटते. दैवी देणगी असल्याशिवाय असल्या कलाकृती जन्म घेत नाहीत. एवढी अफाट बुद्धिमत्ता, कौशल्ये यांचा मध्येच कुठे ऱ्हास झाला या प्रश्नाने खूप पोखरून काढले. आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगावा कि वर्तमान काळातील निष्क्रीयतेबद्दल चिंता व्यक्त करावी या प्रश्नाचा विचार करत संध्याकाळी मुक्कामी पोहोचलो.

क्रमशः


संध्याकाळी ७:०० च्या दरम्यान हंपीमधून बाहेर पडलो. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये परततानाच वाटेतील एका छोट्या हॉटेलमध्ये उत्तप्पा खाल्ला, कारण जेवण करण्याइतपत भूक कोणालाच नव्हती. दिवसभराचा प्रवास आणि भटकंतीमुळे सगळेच खूप दमले होते. त्यामुळे रात्री थोड्याफार गप्पा मारून ९:०० वाजता सर्वजण झोपी गेलो.
पहाटे ५:३० ला मला जाग आली. झोप व्यवस्थित झाल्यामुळे फ्रेश वाटत होते. हॉटेल मध्ये एक फेरफटका मारला. तिथेच न्याहारी करून बाहेर पडायचे असे ठरले असल्याने न्याहारी किती वाजता सुरु होते याची चौकशी करून रूमवर आले. तो पर्यंत बाकीचे उठले होते. ८ वाजेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपून सर्वजण तयार झाले. हॉटेलच्या पूरक नाश्त्यामध्ये इडली, उडीद वडा, पोहे आणि अननस शिरा असे पदार्थ होते. सर्वच पदार्थ रुचकर होते. पण मला त्यातील उडीद वडा खूप आवडला. वडा जितका कुरकुरीत होता तितकाच स्पोन्जी सुद्धा होता. वडा साम्बारावर ताव मारून पुढील हंपी दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी पाहिलं ते कृष्णमंदिर.

ओरिसाचा राजा गजपती याचे साम्राज्य आंध्र व तेलंगणातील काही भागापर्यंत होते. साम्राज्य विस्तार करण्यासाठी इ.स. १५१२ मध्ये कृष्णदेवरायाने ओरिसावर चाल करून तो भाग आपल्या साम्राज्यास जोडला. या स्वारीमध्ये त्याने तेथील बाळकृष्णाची मूर्ती आणली व तिच्यासाठी हे मंदिर बांधले. [बालकृष्णाबरोबरच तहानुसार रायाने आपली तिसरी पत्नी म्हणचेच गजपती राजाची कन्या जगन्मोहिनीशी (हिला पद्मावती सुद्धा म्हणतात) विवाह करून तिला विजयनगरात आणले. या उत्कल लढाईनंतर रायाने सपत्नीक तिरूमल येथे जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेतले होते. या भेटीत त्याने व्यंकटेशास हिरे, माणके तसेच त्याच्या तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी या दोन्ही पत्नींनी चांदीची ताटे आणि पेले दिले होते. त्यानंतर रायाने तिरूमल मंदिरामध्ये दोन पत्नीन्सोबत पंचधातूंच्या मुर्त्या घडवून घेतल्या, ज्या आजहि व्यंकटेश मंदिरात पाहायला मिळतात. इथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे रायाने यावेळेस नवपरिणीत वधू जगन्मोहिनीची मूर्ती का बरे घडवली नसेल? उपलब्ध साहित्यात या दर्शन भेटीमध्ये तिचा कुठेच उल्लेख नाही.]

कृष्ण्मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एक उंच दगडी चौकट आहे. या चौकटीवर एका बाजूला विष्णूचे दशावतार आणि दुसऱ्या बाजूला पोपट, मोर, सारिका इ. पक्षांची शिल्पे कोरली आहेत. हि सर्व शिल्पे एका वेलबुट्टीने बांधली आहेत. चौकटीच्या वरच्या भागावर नागपाश आहेत. बहुदा वाईट शक्तींना बाहेर रोखण्यासाठी तशी योजना असावी.

प्रवेश्द्वारावरची चौकट

प्रवेशद्वार चौकट

चौकटीवरील नाग पाश

chaukat

प्रवेशद्वारावर गोपूर आहे. या गोपुरावर कृष्ण्देवरायाच्या कलिंग स्वारीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच मुख्य मंदिर आहे. मंदिरासमोर बलीशीला आहे. (बाळकृष्णाला बळी दिल्याचे यापूर्वी कधी ऐकले नव्हते.) अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ५० खांबांवर हे दोन्ही मंडप तोलले आहेत. खांबावर गरुड, हनुमान, विष्णूचे इतर अवतार तसेच कृष्णलीला कोरल्या आहेत. या मंडपांच्या तिन्ही बाजूना बाहेरून मोठमोठाली व्यालशिल्पे आहेत.

व्यालशिल्पे

१

c

ग

गर्भगृहामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती, पण ती सध्या एका संग्रहालयामध्ये आहे. मुख्यमंदिराच्या उजव्या बाजूस एक छोटे गणेश मंदिर आहे. गणेश मूर्ती नाहीये पण मूर्तीच्या चबुतऱ्यावरील उंदीरमामा स्पष्ट दिसतात.

गणेश मंदिर

व

गणेश मुर्तीखालील चबुतरा

.

बाळकृष्ण मंदिराच्या मागे उजव्या बाजूस रुक्मिणी मंदिर देखील आहे. अग्न्येय दिशेस पाकशाला आहे व मंदिराच्या चहुबाजूनी पूजापाठ यज्ञविधी करण्यासाठी ओवऱ्या आहेत. दक्षिण भारतामध्ये कोणत्याही मंदिर परिसरात पुष्करणी तलाव असतोच. भाविकांना पूजा अथवा देवास जलाभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी उपलव्ध व्हावे म्हणून हे तलाव बांधतात. नवीन भाविकांना पुष्करणी सहज शोधता यावी म्हणून मंदिराच्या मुख्य भिंतीवर अथवा प्रवेश भिंतीवर एक मत्स्यशिल्प कोरलेले असते. या माशाचे तोंड ज्या दिशेला असते, त्या दिशेस पुष्करणी असते. कृष्ण्मंदिरासमोर देखील पुष्करणी तलाव आहे.

पुष्करणीची दिशा दाखवणारे मत्स्यशिल्प

m

पुष्करणी

p

मंदिरासमोरून एक रस्ता जातो, या रस्त्याच्या पलीकडे एक दगडी आयताकृती दानपेटी आहे. दानपेटीच्या दर्शनी बाजूवर चक्र, गंध, शंख व चंद्र, सुर्य अशी व्यंकटेशाची चिन्हे आहेत. दानपेटीला दोन दगडी झाकणे आहेत आणि पैसे टाकण्यासाठी दोन चौकोनी भगदाडे आहेत. लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करता यावे म्हणून ती दानपेटी ठेवली होती असे आम्हाला गाईडने सांगितले.

दानपेटी

द

पैसे टाकण्याची जागा

द

पुढील ठिकाण चालत जाण्या इतपत अंतरावर होते, त्यामुळे गाडी कृष्ण मंदिराशेजारीच पार्क केली आणि आम्ही चालत निघालो. जाताना एका बाजूला केळीच्या बागा होत्या आणि दुसऱ्या बाजूला भग्नावशेष विखुरलेले होते. वाटेत एके ठिकाणी चौकोनी दगडी कमान लागली. तत्कालीन करवसुलीचे ते ठिकाण होते. कमानीमधून बाहेर पडून ५ ते ७ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला हम्पी मधील मुख्य आकर्षण असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मूर्तीने लक्ष वेधून घेतले. ६.७ मी उंची असलेली ही मूर्ती एकपाषाणी आहे.

न

आर्य कृष्णभट्ट नावाच्या मुर्तीकराने इ.स. १५२८ मध्ये ही मूर्ती घडवली आहे. सप्तफणी शेषाच्या ललितासनामध्ये नरसिंहस्वामी विराजमान आहेत. डाव्या मांडीवर लक्ष्मी होती पण सध्या नाहीशी आहे. सध्या हि मूर्ती विनाछत उघड्यावरच आहे. पण पूर्वी येथे एक ६ खांबी मंदिर होते आणि मंदिराला चंदनी छत देखील होते, परंतु आक्रमकांनी ते छत जाळून टाकले व खांब आणि लक्ष्मीची मूर्ती देखील उद्ध्वस्त केली . आगीच्या ज्वालांची झळ लागून नरसिंहाच्या छातीवर काळा डाग पडला व तडे देखील गेले आहेत. मंदिरातील सहा खांबांपैकी सध्या २ च खांब शिल्लक आहेत. हि मूर्ती उठून दिसते ती नरसिंहाच्या विलाक्ष्ण उग्र डोळ्यांमुळे! खोबणीतून बाहेर आलेले चेंडूच्या आकाराचे गोल गरगरीत मोठे डोळे, विक्राळ सुळे, रुंद जबडा यामुळे मूर्ती अधिकच उग्र भासते. नरसिंह मूर्तीचे पाय देखील तोडले गेले होते आणि ते इतस्ततः विखुरले होते, पुरातत्व विभागाने ते जोडले आणि त्यांना आधार म्हणून गुढघ्यावर एक पट्टा लावला आहे असे आम्हाला गाईडने सांगितले होते. परंतु अभ्यासकांच्या मते तो पट्टा अलिकडचा नसून योगपट्ट आहे.
लक्ष्मीनृसिंह मूर्ती शेजारीच बडवी लिंग मंदिर आहे. बडवी म्हणजे गरीब. एका गरीब स्त्रीने स्वखर्चाने हे मंदिर बांधले आहे. आतमध्ये एक पाषाणी भव्य असे शिवलिंग आहे. शिवलिंग कायम पाण्यात असते. पृवी तिथे तुंगभद्रेचे पाणी येत होते, त्यासाठी चिंचोळी दगडी वाट केली होती. परंतु सध्या पाईपलाईन द्वारे पाणी सोडले जाते. शिवलिंगाच्या साळुंकीवर त्रिनेत्र कोरले आहेत. एका सध्या रेषेने हे नेत्र दाखवले आहेत, यावरून तिथे आणखी काही कोरीव काम करायचे होते, परंतु ते काही कारणास्तव राहून गेले असावे..

बडवी लिंग

ब

येथे एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे ज्या आक्रमकांनी नृसिंह मंदिराचे एवढी नासधूस केली त्यांनी शेजारीच असणार्या बडवी लिंगास धक्का देखील कसा लावला नाही ! याचे कारण काय असावे? शिवलिंग मानवी स्वरुपात नसल्याने तो देव नसून फक्त एक शिल्प आहे असे वाटल्याने सुरक्षित राहिले असावे कि या प्रकारास कुठे तरी शैव वैष्णव संघर्षाची किनार आहे ते त्या नरसिंहास व भोलेनाथासच ठाऊक !!
क्रमशः


शिल्पकार की चतुराई : हम्पी विजय नगर साम्राज्य

चतुर शिल्पकार वही होता है जो निर्माण सामग्री व्यर्थ न होने दे। ऐसी ही कुछ शिल्पकार की चतुराई हमें हम्पी के विट्ठल मंदिर स्थित विष्णु रथ में दिखाई देती है। विष्णु रथ का निर्माण एकाश्म शिला की बजाय पृथक पृथक खंड में हुआ है। जैसे #काष्ठ रथ का निर्माण होता है उसी तरह प्रस्तर से इसका निर्माण प्रस्तर से किया गया है। यह रथ हम्पी का प्रतीक चिन्ह है। इसे देखकर ही समझ आ जाता है कि यह हम्पी है।  

राजा कृष्णदेव राय के काल में हम्पी के विजय नगर साम्राज्य ने चतुर्दिक उन्नति की, हम कह सकते है कि यह विजय नगर के लिए स्वर्णकाल था। विशाल एवं भव्य निर्माण हुए जो हमें आज भी उस काल की याद दिलाते हैं। अगर दो दिन ठहर जाएं तो लगता है कि किसी नई दुनिया में आ गए। यहाँ के भव्य स्मारक व्यक्ति को टाईम मशीन में डाल कर उस काल तक पहुंचाने में सक्षम हैं।

हाँ तो मैं बात कर रहा था विष्णु रथ की। शिल्पकार की चतुराई हमें इसमे जुते हुए गजों के निर्माण में दिखाई देती है। हमको दिखाई दे रहा है कि विष्णु रथ को दो गज खींच रहे हैं। परन्तु रथ को गजों के द्वारा खींचते हुए निर्मित करना मुझे अन्य किसी स्थल के शिल्प में दिखाई नहीं दिया। गजों पर हौदा रखकर माननीयों की उसमें सवारी अवश्य दिखाई देती है। 

अगर हम गज के पार्श्व भाग को ध्यान से देखें तो उसमें अश्व की पिछली टांगे दिखाई देती है। शिल्पकार अश्वों द्वारा खींचा जाने वाला रथ बना रहा था परन्तु किसी तकनीकि कारण या शिला शिल्प में दोष होने के कारण उसने आगे अश्वों की जगह गजों का निर्माण कर दिया। 

लक्ष्मी पति होने के कारण विष्णु की लक्ष्मी सह गजारुढ़ प्रतिमाएँ या चित्र तो मिलते हैं पर गज रथ नहीं मिलता। शिल्पकार की इस चतुराई के कारण एक शिला व्यर्थ होने से बच गई और रथ को नवीन रुप मिलने के साथ उसके निर्माण का अर्थ ही बदल गया है। धन्य हैं ऐसे शिल्पकार, मैं उन्हें सादर नमन करता हूँ।

हम्पीचा गणेश

 

ससिवेकलु गणेश

हेमकूट टेकडीच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे हा सुंदर असा महागणपती. हम्पीच्या इतर स्थापत्या प्रमाणेच हा गणपतीसुद्धा हम्पीच्या सौंदर्यात भरच घालतो आहे. आपल्याकडे एखादे दैवत, एखादे मंदिर आले की त्यासोबत अतिशय सुंदर अशी एखादी तरी दंतकथा येतेच येते. या गणपतीचीही एक अशीच कथा इथे सांगतात. एकदा भरपूर भोजन झाल्यामुळे गणपतीचे पोट एवढे फुगले की ते अगदी फुटायच्या अवस्थेला पोचले. अशा वेळी गणपतीने एक सर्प पकडला आणि आपल्या फुगणाऱ्या पोटाभोवती आवळून बांधला आणि त्याचे पोट वाढायचे थांबले. या नावाचीसुद्धा अशीच एक गंमत आहे. गणपतीचे पोट मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे झाले. स्थानिक भाषेत मोहरीला ससिवेकलु असे म्हणतात, त्यामुळे हा गणपती झाला ससिवेकलु गणेश!

एकसलग पाषाणातून कोरून काढलेली ही गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. बसलेल्या स्थितीत असलेल्या या देखण्या मूर्तीला चार हात असून खालच्या उजव्या हातात सुळा आहे, तर वरच्या उजव्या हातात अंकुश, वरच्या डाव्या हातात पाश आणि खालच्या डाव्या हातात प्रसादपात्र आहे. पोटावर नागबंध दिसतो. मूर्तीभोवती सुंदर असा उघडा सभामंडप बांधलेला आहे. इथे मिळालेल्या शिलालेखानुसार सन १५०६ मधे चंद्रगिरीच्या (सध्या आंध्र प्रदेशात) कोणा व्यापाऱ्याने राजा नरसिंह दुसरा याच्या स्मरणार्थ हा सभामंडप बांधला.

समृद्ध अशा विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे शहर हम्पी. आज जरी बरेचसे शहर उद्ध्वस्त झालेले असले तरीसुद्धा विरुपाक्ष, विठ्ठल, कृष्ण ही मंदिरे आणि सर्वत्र विखुरलेले अवशेष आजही या नगरीत पाहायला मिळतात. शशिवेकालु आणि कडवेकालु असे दोन गणपती हम्पीमध्ये जवळजवळ स्थापित केलेले दिसतात. पकी शशिवेकालु गणपती हेमकूट पर्वताच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे. एकाच दगडातून कोरून काढलेली जवळजवळ आठ फूट उंचीची ही गणेश मूर्ती पाहण्याजोगी आहे.

कडवेकालु गणेश

शशिवेकालु गणेश मंदिराच्या जवळच उत्तर दिशेला कडवेकालु गणेश मंदिर आहे. बहुधा दक्षिण भारतातील ही सर्वात भव्य अशी गणपतीची मूर्ती असावी. ही मूर्ती १५ फूट उंच आहे. या मूर्तीच्या नावाची पण अशीच गंमत आहे. गणपतीची ही मूर्ती एकाच मोठय़ा दगडातून कोरून काढलेली आहे. या गणपतीचे पोट अशा रीतीने घडवलेय की ते हरभऱ्याच्या डाळीच्या दाण्यासारखे दिसते. स्थानिक भाषेत हरभऱ्याच्या डाळीला कडवेकालु म्हणतात, आणि म्हणून हा गणपती झाला कडवेकालु गणेश !

या गणपतीचे मंदिर फारच देखणे आहे. गणपतीच्या मूर्तीच्या बाजूने गर्भगृह बांधून काढले आहे. त्यासमोरील सभामंडप अत्यंत देखणा आहे. सभामंडप आणि त्यावर असलेल्या खांबांवर विविध काल्पनिक प्राण्यांची चित्रे कोरलेली दिसतात. चौकोनी खांब आणि त्यावर असलेली वैशिष्टय़पूर्ण शिल्पकला ही अगदी विजयनगर कलेची खासियत म्हणायला हवी. विविध शिल्पांनी समृद्ध असा हा सभामंडप आणि हा गणपती हम्पी भेटीत न चुकता पाहावा असा आहे.

– स्नेहल आपटे

सोलो ट्रिप - हंपी

सोलो ट्रिप - हंपी

            मित्रांसोबत वा घराच्यांसोबत आपण नेहमीच फिरतो, पण जी मज्जा सोलो ट्रिप म्हणजेच एकट्याने फिरण्यात आहे ती काही औरच, या ट्रिप मध्ये तुम्हाला स्वता सोबत पूर्ण वेळ मिळतो स्वतःला ओळखता येत, स्वतःच्या मर्जी प्रमाणे प्लान करता वा ऐन वेळी बदलता येतात. आपल्याआवडीच्या जागा पाहतायेतात आणि सर्व काही आपल्या मर्जीने. बजेट बॅग पॅकिंग, सोलो ट्रिप या गोष्टींची नेमकी व्याख्या काय ते माहीत नाही, पण यातलाच आपल्याला झेपेल असा काहीतरी प्रकार करून बघावा अस खूप दिवसापासून वाटत होत.या पूर्वी एक एक दिवसासाठी कर्नाळा, अर्नाळा,सिंहगड एकट्याने फिरून आलो होतो, त्यामुळे आता एकट्याने फिरायची सवय झाली होती, मग आता राज्याबाहेर एकट्याने जाऊन बघुयात म्हणून ठिकाण शोधायला सुरवात झाली. मिळणाऱ्या 3 दिवसाच्या सुट्टी मध्ये जास्त लांब जाण शक्य नव्हतं आणि या पूर्वी फक्त उत्तर भारतात फिरणं झालेलं असल्याने आता दक्षिणेकडे जाऊयात, त्यांमुळे भरपूर दिवसापासून लिस्ट मध्ये असलेल ठिकाण म्हणून मग हंपीला जायच ठरलं. तस हंपी ला फक्त तीन दिवसा साठी जाणे हा मूर्खपणाच, कारण हंपी ही जागा घाईगडबडीत फिरण्यासारखी नाही, नुसता भोज्या करण्यासाठी तर अजिबात नाही.26 जानेवारी ते 28 जानेवारी 2020 ही तारीख ठरली, त्या प्रमाणे पनवेल ते हॉस्पेट रिटर्न्स तिकीट काढून झाल्या नंतर जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा पहिला प्रश्न कोणासोबत जातोय, ह्या प्रश्नाच उत्तर एकटा जातोय हे दिल्या नंतर पडायचे ते शब्द कानावर पडलेच, त्यातल्या त्यात ट्रेकिंग साठी नाही जात कळल्या नंतर शाब्दिक मार थोडा कमी मिळाला. या ट्रिप मध्ये फारशी काही डिटेल प्लानिग करायची नाही असे ठरवल असलं, तरी सुदधा हंपी बद्दल थोडीफार माहिती जमवली, आणि बॅग भरायला आणि सामानाची जमवा जमव करायला सुरुवात केली, हंपी जरी काही फार लांब नसला तरी आपण जेव्हा मातृभाषेपासून लांब जातो तेव्हा थोडीफार भीती मनामध्ये असतेच. 

     25 ला शनिवारी संध्याकाळी कळंबोली वरून बस पकडायची होती, त्यामुळे ऑफिस मधून लवकरच निघालो बॅग सकाळीच भरून ठेवली होती, त्यामुळे लगेच बॅग पाठीवर मारून घर सोडलं आणि बसच्या वेळेच्या आधीच कळंबोली गाठली,बस तशी थोडा उशिराच आली, बस मध्ये बसल्या बसल्या अगोदर घरी आणि एकदोन मित्रांना माझा लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवला, त्यामुळे कुठे पोहोचला ह्या प्रश्नासाठी आता फोन येणार नव्हते.रात्री बस एका ठिकाणी जेवणा साठी थांबली जेवण आटपून बस मध्ये झोपी गेलो तो थेट पहाटे 6 च्या सुमारास उठलो, मोबाईल मध्ये लोकेशन बघितलं तर अजून हॉस्पेटला पोहोचायला साधारण एक दिड तास लागणार होते, बसच्या खिडकीचा पडदाबाजूला सरकवला बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती, सूर्योदयापूर्वीच्या भगव्या छटा आसमंतात पसरल्या होत्या आणि खाली हिरवीगार भात शेती मध्येच नारळीच्या बागा एक विलक्षण नजारा डोळ्यासमोर धावत होता.26 जानेवारी अर्थात भारताचं प्रजासत्ताक दिन असल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शाळांमध्ये झेंडावंदना साठी सुरू असलेली लगबग दिसत होती. 7:30 वाजता होस्पेट मध्ये पोहोचलो बसखाली उतरलो तेव्हा हंपी ला घेऊन जाणारे बरेच रिक्षावाले उभे होते, ते हंपीला सोडण्याचे साधारण 150-200 रुपये घेतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थोड्याच अंतरावर असलेल बसस्टँड गाठलं, थोड्याच वेळात हंपी साठी बस लागली होस्पेट ते हंपी हे अंतर 12-13 किमी आहे. 

    बस जसजशी हंपीच्या जवळ पोहोचु लागली तसतश्या छोट्या छोट्या टेकड्या दिसू लागल्या, एकवर एक उभ्या असलेल्या मोठमोठ्या शिळा लक्ष वेधू लागल्या, बस आता हंपीत पोहोचली विरुपक्ष मंदिराच्या समोर बस मधून खाली उतरलो, समोर दिसणाऱ्या विरुपक्ष मंदिराच्या त्या भव्य 105 फूट उंच गोपुराला दुरूनच हात जोडून आधीच ठरवल्या प्रमाणे तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्याकडे चालू लागलो, तुंगभद्रे पलीकडे असणाऱ्या हिप्पी आयलंड वर मुक्कामाची जागा शोधून मग पूर्ण हंपी फिरायची असा प्लॅन होता, पण तिथे समजलं की नदी पार करण्यासाठी असलेली बोट संध्याकाळी लवकर बंद होते, त्यामुळे मग मागे फिरून विरुपक्ष मंदिरा शेजारी असलेल्या वस्तीत रहायच ठरवलं, इथे 200- 1000 पर्यंत छान पैकी होमस्टे उपलब्ध असतात, थोडीफार शोधाशोध केल्यानंतर दोन दिवसाकरिता एक होमस्टे बुक केल खांद्यावरची बॅग उतरली आणि अंघोळ उरकून तयार होऊन लगेच बाहेर पडलो. होमस्टे समोरच्या एका टपरीवर नाश्त्यासाठी बसलो एक मसाला ढोसा आणि एक प्लेट इडली असा भरगच्च नाश्ता झाला, आता दुपारी जेवण वेळेत नाही मिळाले तरी चालणार होते. 

     घड्याळात 10:30 झाले होते, नेमकी हंपी फिरायची सुरुवात कोठून करावी हे ठरवलं नव्हतं, आता थोडाफार गोंधळून जातो की काय असच वाटू लागलं, सोबत एक छोटी बॅग त्यामध्ये एक टॉर्च आणि दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि विरुपक्ष मंदिराकडे चालू लागलो. विरुपक्ष मंदिराच्या समोरून हेमकुटा टेकडीवर चढायला सुरुवात केली टेकडीवर अनेक लहान-मोठे मंदिर, काही तुटलेले अवशेष दिसत होते, पुढे चालत गेल्यानंतर कडेलेकलू गणेश मंदिरात पोहोचलो, कोरीव शिल्पेअसलेल्या स्तंभांवर उभं असलेलं सभामंडप आणि आत गाभाऱ्यात साधारण 15 फूट उंच एकपाषाणी असलेल्या गणरायाच्या दर्शनाने हंपी बघायला सुरवात झाली हा योगायोगच.तिथूनच थोड्याच अंतरावर ससेविकालु गणेशाच मंदिर आहे, दगडी खांब आणि मंडप असलेल्या ह्या मंदिरात गणपतीची सुंदर मूर्ती आहे आकाराने कडेलकलू गणेश मूर्ती पेक्षा कमी आहे ह्या मूर्तीच्या पोटा भोवती नाग गुंडाळलेला आहे, एकाच परिसरात एकाच देवतेची दोन मंदिरा वरून विजयनगर साम्राज्यातील सामाजिक विषमता असावी याची जाणीव करून देत होती.तिथून पुढे दक्षिणेकडे खाली उतरत गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या उग्रनरसिंहाच्या भव्यमूर्ती जवळ पोचलो शेषनागाच्या आसनावर बसलेला नरसिंह आणि त्याच्या डोक्यावर असलेल शेषनागाच छत्र, नावाप्रमाणेच उग्र डोळे या मूर्तीच्या सौंदर्यात भर घालतात, परकीय आक्रमकांनी हंपीतील जवळ जवळ सर्वच मंदिर व वास्तू उध्वस्त केल्या आहेत, उग्र नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आता तिथे नाही ती मूर्ती सध्या कमलापुरा येथील संग्रालयात असल्याचं समजलं. उग्र नरसिंहाच्या मूर्ती शेजारीच बडवलिंग मंदिर आहे इथे एकाच शिळे पासून तयार केलेल 3 मीटर उंच शिवलिंग आहे शिवलिंगाखाली पाणी साचलेलं असल्याने शिवलिंगा जवळ पोहोचता आलं नाही.तिथून बाहेर पडत वरच्या दिशेला लागलो आणि कृष्ण मंदिराजवळ पोहोचलो,

कृष्ण मंदिर 

    कृष्ण मंदिराच्या भग्न गोपुरातून आत प्रवेश केला, आक्रमणा नंतर उध्वस्त झालेला असूनही शिल्लक असलेली ही वास्तू पूर्वी किती सुंदर असावी ह्याची आपण कल्पनाच करू शकतो, ह्या मंदिरात सध्या कोणतीच मूर्ती नाही पण मंदिराच्या खांबांवर आणि कळसावर अनेक कोरीव शिल्प आणि सुंदर नक्षीकाम आजही अस्तित्वात आहे, मंदिराच्या कळसावर असलेल्या गरुडदेवतेच्या मुर्त्या लक्ष वेधून घेतात. ह्या मंदिरासमोरच कृष्ण बाजाराचे अवशेष आहेत त्याच्या समोर सुंदर अशी पुष्करणी आहे,तिथे थोडावेळ घालवून बाहेर पडलो मुख्य रस्त्यावर वर येऊन विजयनगरच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या हंपीच्या दक्षिण भागात जाण्यासाठी चौकशी केली, मग कृष्ण मंदिरासमोरूनच बस पकडून दक्षिण हंपी मध्ये पोहोचलो.

     विजयनगरच्या राजधानीचे हे ठिकाण त्यामुळे ज्यावेळी आक्रमकांनी हंपी उध्वस्त केली त्यावेळी कदाचित सर्वाधिक विध्वंस ह्याच ठिकाणी झाला असावा,इथे मुख्य राजवाडे व ज्या काही मोजक्या वास्तू शिल्लक आहेत त्यांच्या भव्यते व सुंदरते वरून इतर मुख्य वस्तू किती सुंदर असाव्यात याची कल्पना येते.बसथांब्यावरून आत चालत गेल्यानंतर सुरवातीला विजयनगरमधील राण्यांच स्नानगृह आहे, हि वास्तू सुस्थितीत आहे चौकोनी आकाराची हि बाहेरच्या बाजूने बंदीस्त आहे आणि चारही बाजूने खंदकाच्या प्रमाणेच खोदलेले आहे, पण खंदकाला जेव्हढी रुंदी असायला हवी तेव्हढी तिथे दिसली नाही, त्या बाबत विचारणा केली असता स्नानगृहातील पाणी स्वच्छ असावं म्हणून ते आधी बाहेरसाठवलं जायचं आणि त्याच खंदकामधलं पाणी आत वापरलं जायचं अस समजलं, आतल्या बाजूस असलेल्या कमानी आणि खिडक्यांवर सुंदर नक्षीकाम पहावयास मिळतो, विजयनगरमधील पाणी व्यवस्थापनातील कमाल आपल्याला पहावयास मिळतो. तिथून पुढे गेल्यानंतर रॉयल एन्क्लॉसर या भव्य प्रांगणा जवळ पोहोचलो, या ठिकाणी फक्त चौथरे शिल्लक आहेत या मधील महानवमी डिब्बा हा भव्य चौथरा कमाल आहे चौथऱ्यावर सुंदर असा कोरीव काम आहे वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत त्यावरून संपूर्ण परिसर पाहता येतो, महानवमी डिब्बाच्या उजवीकडे सुंदर अशी पायऱ्या पायऱ्यांची पुष्करणी आहे, चौकोनी आकाराची असलेली ही पुष्करणी पाच थरांच्या पायऱ्या पायऱ्यांची सुंदर रचना आहे, त्यात पाणी सोडण्यासाठी दगडांपासून तयार केलेली रचना आज सुद्धा तिथे पहावयास मिळते,

पुष्करणी

    याच परिसरात दरबार आणि राजवाड्याचे अवशेष आहेत पण ते सुस्थितीत नाहीत, या ठिकाणी एक भूमिगत खलबतखाना आहे उंच उंच पायऱ्या उतरून आत खलबतखान्यात उतरलो अंधार असल्याने सोबत आणलेल्या टॉर्चचा इथे उपयोग झाला, या जागेच्या रचणे वरून हि जागा कदाचित राज्यातील मौल्यवान वस्तू व खजिना लपून ठेवण्यासाठी हि कदाचित वापरली जात असावी असे मला वाटले,खलबतखान्यातून बाहेर पडत हरिहर राज्याच्या महालाकडे गेलो आता तिथे फक्त या राजवड्याचा पाया शिल्लक आहे, या वास्तू चा पाया व तिथे असलेल्या पायऱ्या हि वस्तू किती भव्य असावी याची जाणीव करून देतात . तिथून मागे वळून रॉयल एन्क्लॉसर च्या बाहेर पडलो, हजार राम मंदिरात न शिरता कमलमहल आणि राण्यांच्या महालाच्या दिशेनं गेलो, इथे तिकीट घेऊन आत शिरलो समोरच इथे सुध्दा महालाचा फक्त पाया शिल्लक आहे वेगवेगळ्या थरांवर सुंदर असा कोरीवकाम केलेलं असल्याने मूळ राजवाडा किती सुंदर असावा याची आप आपल्या परीने कल्पना करण्याचे स्वतंत्र आपल्या या हि ठिकाणी आहे. बाजूलाच दोन मजली कमल महाल ही वास्तू सुस्थितीत आहे आत जाण्यास बंदी असल्याने तिथून पुढे सरकलो ,पुढे भव्य अशी हत्तीशाळा आहे मध्यभागी एक मोठा घुमट असलेली एक खोली आणि दोनही बाजूना छोटे घुमट असलेले पाच पाच खोल्या अश्या एकूण अकरा खोल्या असलेली ही भव्य हत्तीशाळा बघून झाली.

हत्तीशाळा

     आता घड्याळात 2.30 वाजले होते हंपी चे ते हरवलेल वैभवपाहून तहानभूक हरवून गेलो होतो पण आता सुर्यदेवता क्रोधीत झाल्यासारखे वागत होते उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली होती, त्यामुळे हत्ती शाळेच्या बाजूलाच असलेल्या नारळवाल्याकडे मोर्चा वळवला, नारळपाणी आणि फ्रुट सलाड खाऊन पोटाची भूक शांत करून हत्तीशाळेच्या पाठच्या बाजूला गेलो, थोडे अंतर कापल्या नंतर काही पडक्या मंदिराचे अवशेष नजरेस पडू लागले, पार्श्वनाथ मंदिर, गणेश मंदिर आणि विष्णू मंदिराचे हे भग्नावशेष या ठिकाणी पर्यटक नसल्याने हा परिसर अगदी भयाण भासत होता, त्यात क्रोधीत झालेले सूर्यनारायण आणि खाली तापलेली दगड आता त्रासदेऊ लागली होती त्यामुळे ही मंदिर बाहेरून बघून परत फिरलो, आणि रॉयल एन्क्लोजर परिसरातील हजार राम मंदिरात शिरलो, हजार राम हे मंदिराचे नाव का आहे या बद्दल विचारणा केली असता या मंदिरात रामायणातील प्रसंग कोरले आहेत, त्यात रामाचे एकूण हजार शिल्प आहेत त्यामुळे या मंदिराला हजार राम मंदिर म्हणतात असे कळले. 

हजार राम मंदिर

    आता एव्हढ्या संख्येनं सुंदर शिल्प असलेल्या मंदिराचे निरीक्षण करण्यासाठी किमान अर्धा दिवस तरी द्यावा लागले आणि इथे फक्त तीन दिवसात संपूर्ण हंपी फिरायला आलेलो असल्याने स्वतःहसू आले, या मंदिरातील मुख्य मंदिरातील खांब हंपीतील इतर सर्व मंदिरात व वास्तू मध्ये वापरलेल्या दगडा पेक्षा वेगळे असल्याचे स्पष्ट पणे जाणवतात, बहुदा हे खांब काळ्या ग्रॅनाईटचे असावे या खांबावर वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत मंदिराच्या दोन्ही बाजूस अर्ध मंडप आहेत. सकाळ पासून सुरू असलेली पायपीट आणि कडक्याच ऊन यामुळे थोडावेळ निवांत बसावं म्हणून हजारराम मंदिराच्या डावी कडच्या अर्धमंडपात बसलो, अर्धमंडपात माझी ट्रायपॉड लावून फोटो काढण्याची चाललेली धडपड पाहून एका काकांनी “फोटो काढून देऊ का” असे विचारले, पण एव्हना माझे फोटो काढून झाले होते. ते साठीच्या आसपास असलेले गृहस्थ आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी शेजारी येऊन बसल्या आणि त्यांच्या सोबत गप्पा सुरु झाल्या, जेव्हा ते बंगाली असल्याचे कळले तेव्हा मग आमच्या गप्पा रवींद्रनाथापासून सुरू होऊन रवींद्र संगीत मार्गे कौशकी चक्रवर्ती पर्यंत पोहोचल्या.आता घड्याळात 3:30 वाजले होते त्यामुळे त्यांचा निरोप घेत मंदिरा बाहेर पडलो.

     दक्षिण हंपीमधील जवळ जवळ सर्व ठिकाण फिरून झाली होती, म्हणून मग बसथांब्या जवळ पोहोचलो तेव्हा पाताळ शिवमंदिर राहून गेल्याच लक्षात आलं, मग पुन्हा पायपीट सुरू करून पातळशिवमंदिर गाठलं. जमीनच्या खाली असल्याने या मंदिराला पाताळ शिवमंदिर असे नाव दिले आहे, पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेशकेला दुपारी वेळ असल्याने इथे या वेळी कोणीच नव्हतं, जमिनी खाली असल्याने मंदिरात अंधार व पाणी साचलेलं होत बॅग मधून टॉर्च काढली आणि आत जाण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ गुडघाभर पाण्यापर्यंत आत गेलो पण पुढे पाणी जास्त असल्याने मागे फिरलो, 

पातळशिवमंदिर


    घड्याळाचा काटा चारवर पोहोचला होता, मंदिरा बाहेर येऊन बस पकडून मुक्कामाच्या जागी पोहोचलो, कडक ऊन आणि केलेली पायपीट यामुळे बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. जेमतेम अर्धा तास झोप लागली असावी तेव्हढ्यात जाग आली आणि आजची संध्याकाळ झोपून घालवून जमणार नाही म्हणत फ्रेश होऊन 5 30 वाजता रूम च्या बाहेर पडलो आणि हेमकुटा टेकड्यांकडे निघालो, काही छोटी मोठी मंदिर आणि पडकी सभामंडप समोर मोठ मोठ्या शिळा आणि अस्ताला चाललेले सूर्यनारायण एक भन्नाट नजरा दृष्टीपटलावर पडत होता. 

सूर्यास्ता नंतर विलक्षण नजारा

    सूर्यास्ता नंतर पडलेल्या रंग छटा तर कमालच होत्या सूर्यास्तानंतर काहीवेळ तिथेच घालवून परतीला लागलो, आता अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि समोरचा विरुपक्ष मंदिर आता विद्युतरोषणाईने उजळून निघाला होता आता इथे थांबण्याचा मोह आवरता आला नाही, सूर्यास्त बघण्यासाठी हेमकुटावरती जी काही लोक आली होती ती आता परतली होती, त्या मुळे इथे आता इतकी शांतता होती की मंदिरातून लाऊडस्पीकरवर सुरू असलेल्या कर्नाटकी संगीताचे सुर स्पष्टपणे कानांवर पडत होते, शब्दजरी ओळखीचे नसले तरी मात्र पं.भीमसेनजी आणि जयतीर्थ मेव्हुंडी यांचे ओळखीचे स्वर मध्ये मध्ये ऐकू येत होते, समोर सोनेरी प्रकशात न्हाऊन निघालेलं विरुपक्ष मंदिर आणि कानांवर पडणारे कर्नाटकी संगीतातील ते अनमोल स्वर त्यामुळे ही मैफिल कधी संपूच नये असे वाटत होते.

विद्युतरोषणाईने उजळून निघालेला विरुपक्ष मंदिर 

    साधारणपणे अर्धपाऊन तास या मैफिलीचा आनंद घेतला असेल घड्याळात 8 वाजायला आले होते आणि पोटात सुध्दा कावकाव सुरू झाली होती, त्यामुळे हेमकुटाचा निरोप घेत रूम गाठली फ्रेश होऊन जेवणासाठी मँगो ट्री कॅफे गाठलं, पण तिथे असलेली गर्दी बघून तिथून काढतापाय घेत विरुपक्ष मंदिरा समोर असलेल्या छोट्याश्यागाडीवरती गोभी मंचुरीयन, फ्रयराईस आणि नूडल्स फस्त केले, सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी मातंगा टेकडीवर जायचं असल्याने त्याबद्दल थोडी चौकशी केली आणि रूम वर येऊन ताबडतोब झोपी गेलो.

     दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजण्याच्या अगोदरच जागा झालो, घड्याळात 5 30 झाले होते फ्रेश होऊन मतंगा टेकडीवर जायला तयार झालो, सूर्योदय साधारण 7 च्या आसपास असल्याने 6 वाजताच बाहेर पडलो विरुपक्ष मंदिराच्या अगदी सरळ रेषेत समोरच्या बाजूला चालत गेलो कि मतंगा टेकडी लागते, रस्त्याच्या बाजूला विजेची सोय असल्याने टॉर्च चा वापर करावा लागला नाही, मतंगाच्या पायथ्याशी पोहोचल्या नंतर वर जाणारे टॉर्च दिसले बॅग मधून टॉर्च काढून मातंगा चढायला सुरुवात केली आणि वर जाणाऱ्या त्या टॉर्चना ओव्हरटेक करत मतंगाच शिखर गाठलं. मतंगावर देवीच मंदिर आहे सूर्योदय बघण्यासाठी मंदिरावर जाऊन पोहोचलो तिथे आधीच काही परदेशी पर्यटक बसले होते, अंधार दूर होऊन सूर्योदयापूर्वीच्या रंगछटा आता दिसायला सुरुवात झाली होती, खाली हिरवीगार शेती आणि नारळीच्या बागा आणि लहान मोठ्या टेकड्या आणि टेकड्या च्या मागून होणाऱ्या सुर्यदेवतेच्या एन्ट्रीने निसर्गाच्या रंगमंचावचा तो अप्रतिम सोहळा पार पडला.

मतंगा टेकडीवरचा सूर्योदय

     आज तुंगभद्रानदीच्या पलीकडचा भाग फिरायचा होता, त्यामुळे मतंगावरून काढता पाय घेत रूम गाठली 8.30 वाजता अंघोळ उरकून होमस्टेशेजारी असणाऱ्या गाडीवर जाऊन मस्त पैकी मसाला ढोसा फस्त केला आणि बॅग घेऊन बाहेर पडलो आणि चालत तुंगभद्रेच्या तिरावर पोहोचलो, नदीपार करण्यासाठी एकच मोटर बोट आहे, नदी पार करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये घेतात, अगदी 5 मिनिटात पल्याड पोहोचलो. इथे फिरण्यासाठी भाड्याने सायकल आणि बाईक मिळतात, मला संध्याकाळ पर्यंत हा परिसर फिरायचा होता त्यामुळे मी स्कुटर भाड्याने घ्यायच ठरवलं, 250 रुपयात एका दिवसासाठी गाडी ठरवली आणि तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल थोडीफार माहिती मिळवली मग स्टार्टर मारून सरळ सनापूर तलावाच्या दिशेने निघालो. दुतर्फा नारळाची झाडे हिरवीगार भातशेती आणि त्याच्या मधुन जाणारा रास्ता अश्या सुंदर रस्त्यावर गाडी चालवायला पण वेगळीच मज्जा येत होती, एक दोन ठिकाणी विचारपूस करून सनापूर तलावा जवळ पोहोचलो, सूर्यमाथ्यावर यायला सुरुवात झाली, सनापूर तलावाच्या सर्वच बाजूला आणि पाण्याच्या मधेच असणाऱ्या ग्रॅनाईट च्या दगडांच्या लहान मोठ्या टेकड्या सनापूर तलावाच्या सौंदर्यात भर घालत होत्या, सनापूर तलावाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरन तलावाचा फेरफटका मारला आणि मागे फिरलो. 

    हंपीमध्ये तुंगभद्रेच्या पलीकडच्या या भागात रामायणा सोबत आपले नाते सांगणाऱ्या अनेक जागा आणि वास्तू आहेत, त्याकडे मोर्चा वळवला आणि सर्वात आधी अंजनी टेकडीचा पायथा गाठला,देशात हनुमानाच्या जन्माची जी 4 ते 5 ठिकाण सांगितली जातात त्यातलंच हे प्रमुख स्थान. हंपी ही रामायण काळातील किष्किंधा नागरी असल्याचं सांगितलं जात, त्यामुळे हेच ठिकाण हनुमानाच जन्मस्थान असावं अस वाटत, गाडी पायथ्याला लावून पायऱ्या चढायला सुरुवात केली, संपूर्ण पायऱ्यांवर पत्राशेड असल्याने उन्हाचा त्रास जाणवला नाही. मात्र त्या साधारण 575 पायऱ्या चढताना थोडी दमछाक झाली, टेकडीचढुन वर असलेल्या मंदिरात पोहोचलो दर्शन घेतल्या नंतर थोडा वेळ मंदिरात बसून बाहेर पडलो, मंदिरात जाण्यापूर्वी पायातले बूट काढले असल्याने तापलेली दगड पायाला चटके देत होती, त्या परीस्थित तिथला परिसर अनवाणीच फिरत असताना एक आईस्क्रीमवाला दिसला त्याच्या कडे कुल्फी विकत घेतली भर उन्हात अश्या डोंगरमाथ्याला थंडगार कुल्फी ची मज्जा ती प्रत्येक्ष अनुभवल्या शिवाय कळणार नाही, मंदिराला पुन्हा बाहेरून नमस्कार करून टेकडी उतरायला सुरुवात केली, 

हनुमान जन्मस्थान मंदिर

    टेकडी उतरत असताना वाटेत वर चढणाऱ्या दमलेल्या लोकांना 5 मिनिटात पोहोचाल हा आपला ट्रेकिंगचा डायलॉग चिपकवत खाली उतरलो. पुन्हा स्कूटर वर स्वारहोत पंपा सरोवर गाठलं, शबरी रामाची ह्याच पंपा सरोवर जवळ वाट बघत होती अशी कथा ह्या ठिकाणी सांगितली जाते तसेच अनेक हिंदू देवदेवतांच्या कथा इथे घडल्याचे दाखले इथे दिले जातात,पंपा सरोवराच्या शेजारी असलेल्या आश्रमात थोडा वेळ घालवून मागे फिरलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे वाटेत एका हॉटेल मध्ये थांबलो चारीबाजुनी हिरवीगार भात शेती आणि मध्यभागी असलेल्या त्या हॉटेलात शेतातून थंडगार हवा येत होती, त्यामुळे जेवण आटपून तिथे डुलकी घेण्याचा मोह आवरला नाही, आजची संध्याकाळ हिप्पी आयलंडवर जिथे सूर्यास्त बघायला लोक जमतात त्या टेकडीवर घालवायची होती, परंतु संध्याकाळी नदीपार करणारी बोट बंद असते त्यामुळे लवकरच रूम गाठावी लागणार होती, म्हणून मग परतीची वाट धरली आणि नदीपार करून रूमवर आलो.

    संध्याकाळचा आता काहीच प्लान नव्हता आणि सकाळपासून झालेली धावपळ त्यामुळे झोपण्याचा प्रयत्न केला, पण एखादया ठिकाणी गेल्यावर झोपून वेळ वाया घालविल तो भटक्या कसला, त्यामुळे फ्रेश होऊन बॅग खांद्यावर मारली आणि विरुपक्ष मंदिराच्या समोरच्या सरळ रस्त्यात चालायला लागलो आणि एकलनंदी जवळ पोहोचलो एकच दगड कोरून तयार केलेल्या त्याभव्य नंदीला वंदन करून टेकडी पलीकडे असलेल्या अच्युतराय मंदिराची वाट धरली, सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती त्यामुळे अच्युतराय मंदीरात प्रवेश न करता विठ्ठल मंदिराच्या रस्त्याला लागलो, अच्युतराय मंदिर ते विठ्ठल मंदिर हा मार्ग तुंगभद्रेच्या कडेने जातो या मार्गात अनेक लहान मोठे मंदिर व इतर अवशेष आहेत, त्या सर्व भग्नवस्तू डोळ्यात साठवत विठ्ठल मंदिरा जवळ पोहोचलो तिकीट खिडकीवर पोहोचलो तेव्हा 5-30 झाले होते आणि मंदिर 6 वाजता बंद होतो हे समजल्यामुळे थोडासा हिरमोड झाला,केवळ अर्ध्या तासात घाईगडबडीत बघण्यासारखा विठ्ठल मंदिर नाहीच नाही हे माहिती असल्याने मंदिरात न जाता मागे फिरून आजचा सूर्यास्त तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून बघायचा निर्णय घेतला.

तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त 

    पायात शूज असल्याने नदीपात्रातील वाळूत चालायला जमत नव्हतं त्यामुळे पायातले शूज काढून चालण्याचा प्रयत्न केला खरा, पण दिवसभर उन्हात तापलेल्या त्या वाळूचे चटके बसायला सुरुवात झाली तेव्हा आगीतून फुफाट्यात आल्यासारख वाटू लागले. झपझप पावले टाकून नदीच्या प्रवाहाजवळ पोहोचलो, एका दगडावर बसून पाय पाण्यात मोकळे सोडले तुंगभद्रेच्या त्या वाहत्या पाण्यात दिवसभराचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला.दूरवर नदीपात्रात कोराकल राईड सुरू होत्या समोर सुर्यदेवतेची अस्ताला जायची तयारी सुरू झाली होती, दूरवर दिसणार विरुपक्ष मंदिराच गोपूर आणि त्याच्या पल्याड अस्ताला जाणारा सूर्य आणि नदीच्या पात्रात त्याच पडणार प्रतिबिंब ह्यात गुंगून गेलो असता अचानक कानावर शिट्यांचा आवाज येऊ लागला.आवाजाच्या दिशेने नजरफिरवली असता कोणी तरी हात वर करून इशारा करतोय हे कळलं त्यामुळे तिथून उठून त्याच्यादिशेने गेलो असता नदी मध्ये मगरी असल्याने तिथे असे बसने धोकादायक असल्याचे त्यांच्याकडून कळले,त्यामुळे तिथून काढतापाय घेत परतीला लागलो,

    एकलनदी शेजारच्या मंडपात येऊन बसलो एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता आणि सुर्यास्ताला नंतर च्या छटा आसमंतात पसरल्या होत्या या ठिकाणाहून एकदम सरळरेषेत रस्ता विरुपक्ष मंदिरात जातो याच ठिकाणी थोडा वेळ घालवून होमस्टेवर पोहोचलो फ्रेश होऊन जेवणासाठी बाहेर पडलो ,आज पण मँगो ट्री कॅफे हाऊसफुल्ल होता त्यामुळे पुन्हा आपल्या कालच्या टपरीवर जाऊन जेवण अटपल आणि परत येत असताना हंपीच्या मार्केट मध्ये फेरफटका मारला मग रूम वर येता क्षणी झोपी गेलो .

     दिवस तिसरा आज सुद्धा अलार्म वाजण्याच्या आधीच जाग आली आज हंपी मधील शेवटचा दिवस होता आणि हंपी मधील प्रमुख आकर्षण विठ्ठल मंदिर अजून बघायच बाकी होत, आजचा सूर्योदय हा विठ्ठल मंदिरातून अनुभवायचा या उद्देशाने 5 30 वाजताच रूम च्या बाहेर पडलो, दोन दिवसा साठीच होमस्टे आता खाली करायचं होत त्यामुळे मोठी बॅग पॅक केली आणि रूमची चावी जमा केली आणि मोठी बॅग होमस्टेच्या मालकांकडे ठेवून छोटी बॅग पाठीवर मारून विठ्ठल मंदिराकडे निघालो. कालच चौकशी केलेली असल्याने तिकीट खिडकी 6 वाजता उघडते हे माहीत झाल होत साधारण 2.5 कि मी अंतर असल्याने अर्ध्यातासात आरामात पोहोचेल म्हणून जास्त काही घाई नव्हती मतंगाच्या पायथ्यापर्यंत रस्त्यावरचे दिवे असल्याने आणि मतंगावरचा सूर्योदय बघायला जाणारे पर्यटक असल्याने तिथवर काहीच प्रश्न नव्हता, मात्र तिथून पुढे अंधारातुन एकट्याने जायचं होत बॅग मधून टॉर्च काढली आणि मतंगाची वाट सोडून विठ्ठल मंदिराच्या वाटेला लागलो आजूबाजूला पडलेल्या वास्तूंचे अवशेष आणि अंधारातून रास्ता काढत होतो, मध्येच तुंगभद्रचे पाण्याच्या आवाज येत होता सोबतीला रातकिड्यांचा आवाज होताच नदीच्या दिशेने येणारा थंडवारा अंगाला झोबत होता, त्यामुळे पावलांनी वेग घेतला आणि एकदाच विठ्ठल मंदिरा जवळ पोहोचलो.

    घड्याळात 5.55 झाले होते, जेव्हा तिकीट खिडकीवर पोहोचलो तेव्हा वेळेआधी पोहोचलेले कर्मचारी बघून सुखद धक्काच बसला, तिकिट काढण्यासाठी गेलो असता आजचा दिवसातील पहिलच तिकीट असल्याने सुट्टे पैसे नाहीत अस सांगण्यात आलं, शिल्लक पैसे नंतर घेतो सांगून मंदिराकडे वळलो, पण मंदिराला कुलूप होत शेजारी डुलक्या देणाऱ्या पाहरेकऱ्याला आवाज देऊन उठवलं, त्याने डोळे चोळातच मंदिराचं कुलूप उघडलं आणि मंदिरात कोणत्याठिकानी प्रवेश बंद आहे या बद्दल माहिती देऊन साहेब पुन्हा डुलक्या घ्यायला आपल्या शय्यासनावर गेले, सूर्योदय व्हायला साधारण 15 मिनिटे होती पण सूर्य देवतेच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या रंगछटा आसमंतात पसरायला सुरुवात झाली होती, त्या विश्वप्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या भग्न गोपुरातुन मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला, मंदिर चारही बाजूनी बंदीस्त आहे, पूर्वेकडचा मुख्य दरवाजा आणि उत्तर-दक्षिण दोन दरवाजे असे एकूण तीन गोपुरात असलेले दरवाजे आहेत, मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्याने समोच एक तुळशी वृंदावन लागलं त्याच्या मागे तीन आणखी चौथरे होते आणि त्या चौथऱ्याच्या मागे आणि मंदिराच्या सोमोर होत हंपीची ओळख बनलेलं जगविख्यात दगडी रथ, पूर्ण मंदिर परिसरात माझ्या शिवाय कोणीच नव्हता त्यामुळे फोटो काढू कि मंदिर फिरू आता नेमकं काय करू हेच कळत नव्हतं, शेवटी काहीच न करता दगडी रथा समोर बसून सूर्योदय अनुभवा म्हणून ट्रॅयपॉड वर मोबाईल सेट केला आणि तिथेच बसलो 

विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात अनुभवालेला सूर्योदय

    सूर्योदयाला सुरवात झाली गोपुरा बाजूने सुर्य आपल्या रंगछटा बदलत वर वर येत होता, मधेच एखादी खार अगदी माझ्या समोरून उड्या मारत ये जा करत होती सूर्योदयाच्या तो सुंदर क्षण कधीच न संपवा असाच होता. सूर्योदय तर मस्तपैकी अनुभवला होता आता मंदिर फिरून घेऊ म्हणून उठलो, अजून सुद्धा एकही माणूस इकडे फिरकला नव्हता त्यामुळे मनातून खुश होत मंदिर फिरायला सुरुवात केली . मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत स्वयंपाकगृह मंडप, भजनगृह मंडप,कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. पूर्वी कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जायचा, त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे असुनही त्या स्तंभावर वाजवल्याने आजही ‘सारेगामापाधानिसा’चे स्वर ऐकू येतो, परंतु आता ह्या स्तंभाजवळ जाता येत नाही मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्यास बंदी आहे त्यामुळे पूर्ण मंदिराला परिक्रमा करून घेतली, मंदिर परिसरात असलेली चाफ्याची झाडे बहरलेली होती त्यामुळे मंदिर परिसरात सुगंध दरवळत होता. 

विठ्ठल मंदिर

    विठ्ठल मंदिराच्या चौथऱ्यावर केलेलं बारीक कोरीव काम विलक्षणच आहे, साधारणपणे 8:30 च्या सुमारास मंदिरात लोक यायला सुरुवात झाली तो पर्यंत माझा संपूर्ण परिसर फिरून झालं होत.विठ्ठल मंदिरात अनेक वैशिष्ट्य पूर्ण शिल्प आहेत एकाच शिल्पातून वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार तयार होतात हे माझ्या ऐकण्यात आल होत पण मी पूर्ण मंदिर फिरूनही ते शिल्प माझ्या नजरेस पडलं नव्हतं त्यामुळे माझी शोधाशोध सुरू होती, बराच वेळ गेल्यानंतर शेवटी मी हार पत्करली आणि बाहेर पडण्यासाठी निघालो, तितक्यात समोरून एक 40- 50 जणांचा ग्रुप घेऊन एक गाईड येताना दिसला. तो गाईड विठ्ठल मंदिराचा इतिहास आणि मंदिरा बद्दल माहिती सांगत असताना मी बाजूला उभा राहून ऐकत होतो माहिती सांगून झाल्यानंतर त्याने त्याच्या ग्रुपला मंदिर बघायला आणि फोटो काढायला वेळ दिला आणि तो कल्याणमंडपा शेजारी जाऊन उभा राहिला. मी त्याला मला न सापडलेल्या शिल्पा बद्दल विचारू की नको या द्विधा मनस्थितीत होतो,शेवटी थोडा विचार करून मी त्या गाईड जवळ पोहोचलो आणि त्याला त्या शिल्पा बद्दल विचारल, त्यावर तो गाईड लगेच मला तिथून साधारण 40 50 फुटावर असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या चौथऱ्याजवळ घेऊन गेला, आणि चौथऱ्यात असणाऱ्या त्या शिल्पाच्या वेगवेगळ्या आकृत्या समजावून सांगितल्या, सोबतच आणखी काही वैशिष्ट्य पूर्ण शिल्पाबद्दल महितीदिली त्यातील हत्ती आणि बैल यांचे वेगवेगळे धड आणि एकच डोक्यातून हत्ती आणि बैलाची तयार केलेल आभासी शिल्प कमाल होती, साधारण 10 ते 15 मिनटं मला मोफत माहिती देऊन गाईड त्यांच्या ग्रुप जवळ गेला, मी त्यांचे आभार मानून मंदिरा बाहेर पडलो घड्याळात 10:30 झाले होते पहाटे 6 वाजल्यापासून 10:30 पर्यंत विठ्ठल मंदिरात घालवलेला साडेचार तासाचा काळ खूपच कमी वाटत होता, त्याअद्भुत स्थापत्याला अनुभवण्यासाठी हा वेळ फारच कमी होता त्यामुळे मानातल्या मनात "फिर मिलेंगे" म्हणत विठ्ठल मंदिरा बाहेर पडलो. 

    हंपीत आल्याबरोबर फिरताना करत असलेली घाई आता आपोआप कमी झाली होती, आता एकाच ठिकाणी जास्त वेळ द्यावासा वाटत होता, विठ्ठल मंदिरातून बाहेर पडल्यावर विठ्ठल बाजार आणि त्याच्या समोर असलेला शिव मंदिर बघून अच्युतराय मंदिराची वाट धरली, आता ऊन वाढायला सुरवात झाली होती त्यामुळे झपझप पावले टाकत अच्युतराय मंदिर गाठलं, मंदिराच्या प्रवेश मार्गात अतिशय सुंदर पुष्करणी आहे, ह्या पुष्करणी च्या मध्यभागी चार दगडी खबांचे मंडप आहे, खांबावर कोरीव शिल्प आहेत तसेच चौथऱ्यावर हत्तींची शिल्प कोरली आहेत, हम्पी मधील इतर मुख्य मंदिरा प्रमाणे अच्युतराय मंदीराच्या समोर सुद्धा बाजारपेठेचे अवशेष आहेत, मंदिराच्या भग्न गोपुरातून मंदिराच्या आत प्रवेश केला, मंदिराला दोन आयताकार तटबंदी आहेत, हा मंदिर अच्युतरायाच्या कारकिर्दीत तयार केला असल्याने हा मंदिर अच्युतराय मंदिर या नावाने ओळखला जातो. हा मंदिर तिरुवेन्गलनाथ ह्या भगवान विष्णूच्या रुपाला समर्पित आहे, मंदिराच्या खांबांवर सुंदर शिल्पकाम केलेलं आहे, मुख्य गाभाऱ्यात कोणतीही मूर्ती नाही, मुख्य गभऱ्यातून बाहेर आलो आणि प्रदक्षिणा मंडपात येऊन बसलो, बाहेर ऊन तापलं होत, दगडीखांबांवर उभा असलेला दगडी मंडपात थंडावा होता आणि हंपी मधील इतर मंदिराच्या तुलनेत पर्यटक इथे फिरकत नाहीत त्यामुळे शांतता होती, ट्रायपॉड सेट करून फोटो काढून घेतले, 



अच्युतराय मंदिर 


    आता दुपारचे 12 30 वाजले होते मी तयार केलेल्या लिस्ट मधील सर्वच ठिकाण फिरून झाली होती, कोराकल राईड करायची तेव्हढी बाकी होती, बांबू पासून तयार केलेली गोलाकार होडी म्हणजे Coracal, हंपी मध्ये तुंगभद्रा नदी आणि सनापूरलेक मध्ये फार सुंदर कोराकल राईड उपलब्ध असतात, संध्याकाळच्या शांत वातावरणात कोराकल राईडची मज्जा वेगळीच, पण मागील दोन दिवसात माझी वेळेची सांगड न बसल्याने मला काय कोराकल राईड करता आली नव्हती, त्यामुळे चक्क दुपारी 12:45 वाजता मी तुंगभद्रा नदीत कोराकल राईड साठी चक्रपाणी तिर्थ हे ठिकाण गाठलं, वाटेत काकडी आणि कैऱ्या विकायला होत्या ऊन जास्तच वाढत होता, काकडी आणि कैरी खाऊन घेतल्या होत्या त्यामुळे इतक्यात जेवण्याचा प्रश्न नव्हता, भर दुपारी कोणी इकडे फिरकत नसल्याने होडीवाला झाडाखाली झोपला होता, त्याला उठवले असता एका माणसासाठी तो काय तयार होत नव्हता, त्याला तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर तो तयार झाला, तोही फक्त नदीच्या मध्यभागातून परत आणणार ह्या बोली वर तो तयार झाला, भर उन्हात नदीत नौकायनाचा हट्ट मी का करत होतो ते माझे मला ही कळत नव्हते. बांबूपासून तयार केलेल्या त्या गोलाकार होडीत बसल्या पासून नदीच्या मध्यभागी पोहोचे पर्यंत नदीपल्याडच्या भव्य शिळा जवळ येत असल्याचा भास होत होता, मध्यभागी गेल्यावर नावाड्याने पकडून ठेवायला सांगितले त्यानंतर त्याने एकाच बाजुला जोरात वल्हे मारायला सुरुवात केली, त्यामुळे होडी गोल गोल फिरु लागली त्याने आणखी जोर लावला होडी आणखी वेगाने गोल गोल फिरू लागली थोडयावेळाने तो थांबला आणि किनाऱ्याकडे वळलो एक अनोखा अनुभव घेऊन होडीतून बाहेर पडलो ,आणि परतीच्या वाटेला लागलो, 

कोराकल राईड


    हंपीच्या वस्ती पर्यंत पोहचे पर्यंत १:३० झाले होते, जेवण्यासाठी हंपीतील प्रसिद्ध मँगो ट्री कॅफे गाठलं, रात्री सारखी गर्दी नसल्याने आत प्रवेश केला, कॅफे परदेशी पर्यटकांनी भरला होता जेवण यायला थोडा उशिरच झाला, जेवल्यानंतर या कॅफेची प्रसिद्ध अशी थंडगार बनफी-पाय खाल्ली आणि ढेकर देत बाहेर पडलो, हंपीत उतरल्या बरोबर जे पाहिलं मंदिर नजरेस पडलं होत, ज्या मंदिराला मध्यवर्ती ठेवून संपूर्ण 3 दिवसाचा कार्यक्रम आखला होता आणि ज्या मंदिराच्या अगदी बाजूलाच मुक्काम होता, त्या विरुपक्ष मंदिरात आजून जाणं झाल नव्हतं, हंपीत आल्या पासून अनेक मंदिर फिरलो त्यातील अंजनेरी वरील हनुमान मंदिर वगळता कोणत्याही मंदिरात पूजा होत नव्हती, कारण की तिथे मूर्त्याच नव्हत्या आणि ज्या ठिकाणी मुर्त्या होत्या त्या भग्ना अवस्थेत. हंपी मधील पूर्वी पासून पूजा होत असलेल एकमेव मंदिर म्हणजे विरुपक्ष मंदिर त्यामुळे इथे भाविकांची गर्दी असते, हंपीत मंदिरात देव नसल्याने कोठेही पायातून बूट काढावे लागले नव्हते, विरुपक्ष मंदिराबाहेरील चप्पल स्टँडवर बूट ठेऊन भव्य गोपुरातून मंदिरात शिरलो, गोपुरावर देवदेवतांची शिल्प आहेत, लाईनला लागून मंदिरात शिरलो दुपारची वेळ असल्याने दर्शन लवकरच झाले, मंदिराच्या गर्भगृहात अनेक शिल्प आहेत पण दर्शनासाठी गर्दी असल्याने ती पाहायला जास्तवेळ देता आला नाही समोरच्या रंगमडपात मात्र निवांत वेळ देता आला, रंगमडपातील छतावरची भिंती चित्रे कमाल आहेत, त्यात अनेक पौराणिक घटनांचे प्रसंग चित्रित केले आहेत त्यात भगवान विष्णूचे दशावतार, शिव पार्वती लग्नाचा प्रसंग, द्रौपदी स्वयंवर असे प्रसंग आहेत, त्याच बरोबर अनेक शिल्प सुद्धा कोरली गेली आहेत, विरुपक्ष मंदिरात खूप मोठ्याप्रमाणात वैशिष्ट्य पूर्ण शिल्प आहेत ती सगळी मला काय बघता आली नाही, 

    संध्याकाळी होसपेट वरून परतीची बस पकडायची असल्याने मंदिरातून घाईघाईने बाहेर पडलो, आणि मुक्कामाच्या घरात जाऊन बॅग घेऊनआणि पाठीवर मारली, पुन्हा विरुपक्ष मंदिरा समोर आलो मंदिराच्या भव्य गोपुराला बाहेरून वंदन करून या तीन अविस्मरणीय दिवसासाठी धन्यवाद मानून पुन्हा एकदा कधीतरी निवांत हंपी यात्रा घडावी हेच मनोमन देवाकडे मागून परतीची बस पकडली.

विरुपक्ष मंदिर

http://shailendrabhatkya.blogspot.com/


 

आज दुपारी प्रकाश कुंटे यांचा २०१७ साली आलेला हम्पी झी टॉकीज वर पाहिला. चित्रपटाची सुरुवात ईशा ( लहान सोनाली) ... तर ती आपल्या आई वडिलांच्या घटस्फोट मुळे काहीशी डिस्टर्ब होऊन तिच्या मैत्रिणी सोबत हम्पी फिरायचा प्लान करते. मैत्रीण न आल्या मुळे ही एकटीच निघते. सुरुवातीलाच अंतर्वस्त्र वाळत घालताना तिची कबीर (ललित प्रभाकर) सोबत ओळख होते. जे कर्म धर्म संयोगाने एकाच लॉज मध्ये राहत असतात. खरंतर माझ्या वैयक्तिक मते या सीनची काहीच गरज नव्हती, उगाचच मराठी चित्रपट बोल्ड होतोय हे दाखवायचा फुकाचा अट्टहास. तो तिचा फोटो घेतो मग काहीशी व्यक्तिविशेष त्याची वही दाखवत त्यात लावतो. मग भेटी गाठी एकत्र फिरणं, हळू हळू प्रेमात पडणं हा चित्रपटाचा भाग.. हॅपी गो लकी या स्वभावाचा कबीर तर झाल्या प्रसंगामुळे काहीशी नाराज आणि धक्क्यातून सावरलेली नसलेली जणू काही चांगलं घडणारच नाही अशी धारणा मनी ठेवून असलेली ईशा. 

मला स्वतःला वाटलं की हम्पी चा योग्य वापर सिनेमेटोग्राफर ला अजुन चांगल्या रित्या करता आला असता. इतकी हम्पी ची भव्यता आहे. १५-१६ व्या शतकातले सर्वात समृद्ध असे विजयनगर चे साम्राज्य. राजा कृष्णदेवराय.. शेकडो मंदिर आणि अनेक महाल वाडे तलाव सर्व काही त्यात या जागेला रामायणाचा पौराणिक संदर्भ सुद्धा आहे. सीतेचा शोध घेताना किष्किंधा नगरी हे वाली चे राज्य ज्याचा नंतर सुग्रीव वध करून राजा झाल्यावर रामाला मदत करतो. याच तुंगभद्रा नदीच्या पलिकडे एका अंजनी टेकडीवर हनुमानाचा जन्म झाला अशी अख्ययिका आहे. त्याच किष्किंधा नगरीत जवळच वालीचा किल्ला. इतिहासात नंतर बहमनी सुलतानांनी हे सारं साम्राज्य विध्वंस केले. बिदर शाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, कुतुबशाही या सर्व याच बहीमनी च्या शाखा, सारे एकाच माळेचे मणी. १४ व्यां शतकातील फारूखी राजवटी नंतर यांचा शिरकाव कसा झाला त्या बद्दल नंतर कधीतरी.. या सर्व शाह्या एकत्र येऊन जवळपास दिड वर्षे हे सुवर्ण हिंदू साम्राज्य लुटत जाळत तोडत होत्या. एवढं करून आता हे हम्पी पाहून डोळे दिपतात तर या आक्रमण होण्याआधी राजा कृष्णदेवराय ज्याच्या काळात एकदम पीक पॉईंट ला असताना कसे असेल याची कल्पनाच करवत नाही. असो.. आता थोड वर्तमानात येऊ. एकंदर चित्रपटात फोकस फक्त हम्पी मधील मुख्य देवाचे मंदिर अर्थातच विरूपाक्ष मंदिर. त्या मागील हेमकुटा परिसर. मंदिरा मागील तुंगभद्रा नदीचे पात्र तिथले काही लँड् स्कॅप भारी. बाकी विठ्ठल मंदिर तेथील जग्गनाथ पुरी येथील रथा सारखा रथ जो राजाने इथे हम्पी मध्ये बनवून घेतला तो तर मुख्य आकर्षण. राण्याचे महल लोटस टेम्पल तिथे ईशा चा डान्स. एक सीन मातंग टेकडी वर घेतला आहे. ईशा ची मैत्रीण, गिरिजा ( प्राजक्ता माळी) हीची एन्ट्री झाल्यावर चित्रपट वेग घेतो. तिचा वावर सहज आणि आवडणारा. इथल्या मोठ्या पाषाण शिळे भोवती थोडीफार फिलॉसॉफी उलगडत जाण्याचा कबीर प्रयत्न करतो. पर दुनिया मे किताना गम है पर उससे कही जादा मेरा गम है याच आविर्भावात ईशा असते. मोठे शब्द वापरून प्रसंगात जान आणली आहे अशाच एके ठिकाणी कबीर आणि ईशा मध्ये बाचाबाची होते. कबीर तिला इतरांच्या दुःखाच्या तुलनेत आपण सुखी आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण नाही... मग नेहमी प्रमाणे ईशा ला नंतर घडल्या प्रकरणाचे वाईट वाटते. त्याची माफी मागावी असे ठरवून दुसऱ्या दिवशी पाहते तर कबीर चेक आउट करून गायब. इथे गिरिजा ला परत जावं लागतं. मग सुरू होतो तो ईशाचा विरह मग त्याचा शोध घेत हम्पी मध्ये फिरणं. त्यांनी एकत्र घालवले क्षण ती आठवण. तिथल्या स्थानांची तिच्या मनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न चांगला जमलाय. तिथल्या ओळख झालेल्या व्यक्तींचा निरोप घेत हम्पी तून निघते. तोच वाटेत एका वरातीत हॅपी गो लकी कबीर नाचताना दिसतो. पुढे एकदुसऱ्याच्या प्रेमाची कबुली... चित्रपट संपतो.. जेमतेम दीड पावणेदोन तासातच...

कॉमन लव स्टोरी, बॅक ग्राउंड वर दाखवण्यासाठी खूप काही अर्थात पुन्हा हे माझेच मत. पण फार भट्टी जमून नाही आली. बाकी चित्रपटातील एक संवाद लक्षात राहतो. पैसा है तो तिरुपती जाओ, पैसा कमाना है तो मुंबई जाओ, आंख है तो बेलूर जाओ, पैर है तो हम्पी आओ.

गेल्या वर्षी भेट दिलेल्या माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्या हम्पी बद्दल हा छोटासा लेखन प्रयत्न...    

                                                  योगेश चंद्रकांत अहिरे

http://ahireyogesh.blogspot.com/2023/04/hampi.html









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...