Sunday, December 13, 2020

विविधरंगी बस्तर

 

बस्तरची तोंडओळख

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्यात मारले गेलेले पोलीस किंवा नागरिक याव्यतिरिक्त काही दिसतच नव्हतं. आधीच दुर्गम प्रदेश आणि त्यात असे असुरक्षित वातावरण. त्यामुळे एकट्याने प्रवास करणे जरा अवघडच होणार होते. योगायोगाने एका माहितीतल्या ग्रुपने पुढच्याच महिन्यात चार दिवसांची बस्तर ट्रीप आयोजित केली असल्याचे फेसबुकवर वाचनात आले. सुट्टीचं आणि पैशाचं गणित जुळतंय हे बघून मी ताबडतोब ट्रीप बुक करून टाकली.

बस्तर जिल्ह्याचे स्थान 
बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर, दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता. साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. आमची ट्रीप दसऱ्याच्या सुमारासच आयोजित केलेली होती. या वर्षीचा परतीचा पाऊस रेंगाळला होता. नवरात्र सुरु झाले तरी अधूनमधून सरी येत होत्या. त्यामुळे कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार वनराईसोबत एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार या विचाराने मी भलत्याच उत्साहात होतो. 

यथावकाश प्रवासाचा दिवस उजाडला. संध्याकाळी साडेआठला सुटणाऱ्या समरसता एक्स्प्रेसचे आरक्षण होते. यावेळी ग्रुप केवळ दहा जणांचा होता. सगळ्यांशी ओळखी-पाळखी झाल्या आणि आमचा प्रवास सुरु झाला. मुंबई ते रायपूर म्हणजे सुमारे अठरा तासांचा प्रवास. एवढा प्रवास, तोही स्लीपर कोचमधून करायचा म्हणजे मी थोडा धास्तावलोच होतो. पण ऑफ सिझन असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती. दिवसभरच्या दगदगीने मी शिणलो होतो. बर्थ मिळताच आडवा झालो. स्लीपर कोच मधल्या कोलाहलातली झोप म्हणजे यथा-तथाच. थोडाफार वेळ डोळा लागला तरी खूप. म्हणता म्हणता गाडी रायपूरला पोहोचली. भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाचा मान राखत गाडीने चांगला दीडेक तास उशीर केला होता. लांबच्या प्रवासाने आम्ही सगळेच कंटाळले होतो. त्यात पावसाची चिन्हं दिसत होती. त्या उष्ण आणि दमट हवेत जीव नकोसा होत होता. इथून पुढे बस्तरमधली एक स्थानिक पर्यटन कंपनी आमची व्यवस्था बघणार होती. त्या कंपनीचे प्रतिनिधी पार्किंगच्या जागेत आमची वाट बघत थांबले होते. आम्ही येताच त्यांनी गळ्यात हार आणि कपाळाला गंध लावून आमचे जंगी स्वागत केले. इतक्या प्रसन्न स्वागताने आमचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला! मोठ्या उत्साहात आम्ही बसमध्ये बसलो. 

रायपूरमध्ये झालेले जंगी स्वागत 

आमचा पहिला मुक्काम होता चित्रकोट धबधबा. रायपूरहून तिथले अंतर होते सात तासांचे! थोडक्यात प्रवास अजून संपला नव्हताच! मजा-मस्ती करत आमची गाडी चित्रकोटकडे निघाली. वाटेत थोडा वेळ जेवणासाठी थांबून आम्ही पुढे रवाना झालो. अंधार पडल्याने आजूबाजूचा निसर्ग काही अनुभवता येत नव्हता. मी गुमान कानात हेडफोन घालून झोपायचा प्रयत्न करू लागलो. निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. अखेरीस रात्री एकच्या सुमारास आम्ही चित्रकोट धबधब्याला पोहोचलो. बसमधून उतरलो आणि एक ओलसर गारवा अंगाला जाणवला. दूर कुठेतरी पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. अंधारात चाचपडत आम्ही कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. कंपनीचा संचालक जीत सिंग तिथे स्वागताला हजर होता. तिथल्या आदिवासी सहाय्यकांनी ढोल वाजवून आणि हातात रानफुले देऊन सगळ्यांचे स्वागत केले. इथल्या लोकांनी “अतिथी देवो भव” फारच मनावर घेतलेले दिसत होते. त्यांच्या स्वागताच्या पद्धती कितीही छान असल्या तरी त्यांना छान म्हणण्याइतकेही त्राण आता अंगात उरले नव्हते. आता मात्र झोप अनावर होत होती. एकदाची तंबूत बॅग टाकली आणि निद्राधीन झालो.   


चित्रकोट जलप्रपात

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता. रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती नदीचे पात्र, त्याला आलेला काहीसा अंतर्वक्र आकार, आणि त्यावरून धबाबा कोसळणारे फेसाळते पाणी. मंद धुक्यातून पूर्व क्षितिजावर उगवलेला सहस्ररश्मी, त्याच्या केशरी प्रभेत न्हालेला आसमंत, पहाटेची निश्चल शांतता, आणि तिला पुरून उरणारा त्या प्रपाताचा ध्रोंकार! सारे विलक्षणच होते. मी ताबडतोब कॅमेरा काढला आणि तो क्षण बंदिस्त केला. अर्थात, कॅमेऱ्याच्या सेन्सरवर उमटलेले ते चित्र आणि त्या क्षणाची अनुभूती यात जमीन-अस्मानाचे अंतर होते. असो. 

पहाटेच्या केशरी प्रकाशात चित्रकोट धबधबा 

कॅम्पसाईटच्या बाजूलाच एक निरीक्षण मनोरा उभारलेला होता. त्याच्या खाली दोन-चार खोल्या, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची व्यवस्था उपलब्ध होती. खालच्या खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध व्हायला अजून वेळ होता. मुख्य म्हणजे अजून विजेची व्यवस्था झालेली नव्हती. जीतने मोठ्या कल्पकतेने ती जागा कॅम्पसाईट साठी निवडली होती. मनोऱ्याच्या गच्चीवरून तर धबधब्याचे दृश्य अधिकच मोहक दिसत होते. एक-एक करत सारी मंडळी उठली. तेवढ्यात चहा आलाच. गच्चीवरून धबधबा न्याहाळत आम्ही गरम चहाचा आस्वाद घेत होतो. एकीकडे जीत बस्तरची आणि लोकजीवनाची माहिती देत होता. जीत मूळचा जगदालपूरचा. उच्च शिक्षण, मग मोठ्या शहरात नोकरी, आणि देशभर भटकंती करून तो आपल्या मूळ शहरात परतला होता. बस्तरचे अनवट सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी त्याने Unexplored Bastar नामक कंपनी सुरु केली. पर्यटकांना त्यांचा पसंतीनुसार रूपरेषा बनवून देण्यासोबतच स्थानिक लोकांना रोजगार, त्यांच्या संस्कृतीचे जतन, आणि पर्यावरण संवर्धन असा व्यापक हेतू डोळ्यांसमोर ठेऊन तो काम करतो. सध्या तरी सुरुवातीचे दिवस आहेत. पण एकंदरीत मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. त्याच्या धाडसाचे आणि ध्येयासक्तीचे आम्हा सगळ्यांनाच फार कौतुक वाटले. एव्हाना आठ वाजत आले होते. नाश्ता तयार व्हायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे आधीच धबधब्यावर जाऊन यायचे आम्ही ठरवले. 

मनोऱ्याच्या गच्चीवर

मनोऱ्याच्या मागच्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. वाट कसली, चांगला बांधलेला जिनाच होता तो. तिथून खाली उतरून आम्ही नदीच्या पात्राजवळ पोहोचलो. काठाने वाढलेल्या झाडीतून वाट काढत प्रवाहाच्या डाव्या अंगाने धबधब्याजवळ जाऊ लागलो. पाण्याचा प्रवाह कमी असतो तेव्हा त्या वाटेने चक्क मुख्य धबधब्याच्या मागे जाता येते. मात्र सध्या प्रवाह चांगलाच तेजीत होता. शिवाय पुढचे दगड निसरडे झाले होते. त्यामुळे ठराविक अंतरापर्यंतच जायला मुभा होती. झाडीतून बाहेर पडलो तसे नदीचे पात्र नजरेस पडले. तिथे एक स्थानिक तरुण लहानशी होडी घेऊन उभा होता. होडीतून पात्राच्या मध्यात जाऊन समोरासमोर धबधबा पाहण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक होतो. सगळ्यांनी लगेचच त्याच्यासमोर रांग लावली. तिथे गर्दी झालेली बघून आम्ही दोन-तीन जणांनी थोडे आसपास फिरून यायचे ठरवले. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालो. 

धबधब्याच्या समोर घेऊन जाणारा नावाडी 

चिंचोळी वाट 
आता डावीकडे उंच कडा आणि उजवीकडे नदीचे पात्र अशा चिंचोळ्या पट्ट्यातून ती वाट जात होती. कड्याच्या पोटात काही गुहा खोदलेल्या दिसत होत्या. त्यात काही शिवलिंगे आणि कोरीव मूर्तीही दिसत होत्या. कधी काळी इथे एखादे मंदिर असावे. काही अंतरातच ती वाट प्रचंड शिळांच्या ढिगाऱ्यात हरवली. पुढे जाणे धोकादायक होते. आम्ही तिथेच थांबलो. धबधब्याचा ध्रोंकार आता कानांवर आदळत होता. प्रवाहाची एक लहानशी धार कुठूनतरी वेगळी होऊन डावीकडच्या कड्यावरून समोरच्या दगडावर कोसळत होती. त्याचे तुषार अंगावर उडत होते. त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शिळा, बाजूला विखुरलेले कोरीव भग्नावशेष, आणि समोरचा तो महाकाय जलप्रपात त्या जागेला एक अद्भुत आयाम देत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी काही क्षण ती जागा अनुभवत शांत उभा राहिलो. समोर कोसळणारी ती धार खुणावत होती. फार विचार न करता मी सरळ त्या धारेखाली जाऊन बसलो. थंड पाणी मस्तकावर आदळले आणि एक शिरशिरी देहात जाणवली. क्षणभर कुडकुडलो, पण लगेचच त्या तापमानाला शरीर सरावले, आणि मन त्या प्रवाहाशी जणू एकरूप झाले. ब्रह्मानंद म्हणतात तो हाच का? 

अद्भुतरम्य जागा 
किती वेळ मी तिथे बसलो होतो देव जाणे! माझी तंद्री भंगली तेव्हा कळले की सोबतचे दोघे कधीच मागे गेले होते आणि कोणीतरी लांबून मला हाका मारत होते. चरफडतच मी उठलो आणि कॅम्पसाईटवर परतलो. नाश्ता तयार होता. खास बस्तर पद्धतीचा दालवडा आणि चटणी यांवर आम्ही ताव मारला. सोबतीला चहाची अजून एक फेरी होतीच. आता उन्हं वर आली होती. धबधब्याच्या बाजूने काहीसे फिकट इंद्रधनुष्य तयार झाले होते. दिवसाच्या प्रत्येक वेळी तो धबधबा आपल्या सौंदर्याची वेगळी छटा दाखवत होता. त्याचे किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस जीत म्हणाला, अजून तीन-चार धबधबे बाकी आहेत बघायचे. कॅमेऱ्याची बॅटरी आणि मनाचा उत्साह जपून ठेवा! तरी मी अजून थोडे फोटो काढलेच. सगळ्यांचा नाश्ता आणि आन्हिकं उरकल्यावर आम्ही आसपासच्या इतर काही जागा पाहण्यासाठी बाहेर पडलो.  



उन्हं वर आल्यावर चकाकणारे धबधब्याचे पाणी 



मेंद्री घुमड धबधबा आणि बस्तरचे पारंपरिक भोजन

चित्रकोट धबधब्याचे रौद्रसौंदर्य अनुभवून आम्ही आसपासच्या काही जागा बघायला बाहेर पडलो. बस्तर जिल्हा वनसंपदेसोबतच अनेक लहानमोठ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या यादीतली पहिली जागा होती मेंद्री घुमड धबधबा. चित्रकोटवरून बस निघाली आणि बस्तरच्या अनवट रांगड्या प्रदेशातून आमचा प्रवास सुरु झाला. सगळीकडे भातशेती डवरलेली दिसत होती. रोपांची पाती दुपारच्या उन्हात चमकत होती. त्या नाजूक पोपटी रोपांमध्ये जणू अवघ्या विश्वाची क्षुधातृप्ती सामावली होती. आकाशात एखाद-दुसरा काळा ढग उगीच वाट चुकल्यागत रेंगाळलेला दिसत होता. 

डवरलेली भातशेती 

अर्ध्या तासातच आम्ही एका पठारावर येऊन पोहोचलो. तिथे इतरही काही गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. पण धबधबा काही कुठे दिसत नव्हता. लांब कुठेतरी लोकं जमलेली दिसत होती. त्यापुढे दरी आणि तिथेच धबधबा असावा बहुतेक. आम्ही त्या दिशेने चालत पुढे निघालो. थोडं अंतर जाताच वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवला. हा नक्कीच दरीतून उसळून वर येणारा वारा. आता उत्सुकता अजूनच ताणली जात होती. पाचेक मिनिटं पुढे गेलो आणि एक विस्तीर्ण दरी नजरेस पडली. नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडीने ती दरी व्यापलेली होती. दरीच्या डाव्या कोपऱ्यातून एक पांढरीशुभ धार खाली कोसळताना दिसत होती. पठाराच्या खडकाचा तांबूस रंग आणि दाट वनश्रीचा गडद हिरवा रंग त्या शुभ्र फेसाळत्या धारेला उठाव देत होते. वाऱ्याच्या वेगाने मधेच ती धार विस्कळत आणि हेंदकाळत होती. जणू धारेतले ते थेंब वाऱ्याच्या मदतीने रोलरकोस्टर राईडचा अनुभव घेत होते. कोसळणारे पाणी, मग ते कोणत्याही स्वरूपात असो, मनाला एक वेगळाच आनंद देते. कुठे चित्रकोट प्रपाताचा एखाद्या तपस्वीच्या मुखातून निघालेल्या ओंकारागत भासणारा प्रचंड ध्रोंकार, तर कुठे लहानग्या मुलीने मांडलेल्या भातुकलीच्या खेळासारखा वाटणारा मेंद्री घुमडचा प्रवाह. रूप वेगळे, आकार वेगळा, पण मनात उमटणारे तरंग तेच! वाहते पाणी बघून मेंदूत काही ठराविक संप्रेरके निर्माण होत असावीत कदाचित. असो. त्या जागी निवांत बसावं आणि नुसता निसर्गाचा अवखळ खेळ पहात रहावं असं वाटत होतं. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच असावं बहुतेक. आतापर्यंत वाट चुकून रेंगाळलेले वाटणारे काळे ढग आता मेंढरांच्या कळपासारखे आकाशात गर्दी करू लागले. दरीतून घोंघावणारा वारा त्यांना अजूनच प्रोत्साहन देऊ लागला. वातावरणाचा बदलता नूर पाहून आम्ही घाईघाईत तिथे दोन-चार फोटो काढले आणि बसच्या दिशेने धावलो.

मेंद्री घुमड धबधबा 
धबधब्यासमोरची विस्तीर्ण दरी 

बाजारातले भाज्यांचे ठेले 
रस्त्यात एका ठिकाणी बाजार भरलेला दिसला. दसऱ्याचा दिवस असल्याने बाजार चांगलाच फुललेला दिसत होता. जरा चक्कर मारू म्हणून खाली उतरलो. पाऊस भुरभुरत होता. पण भिजण्याइतका जोर नव्हता. बरेच भज्यांचे ठेले होते. गरमागरम भज्यांचा वास भूक चाळवत होता. एकीकडे सुक्या मासळीचे ठेले होते. तर पलीकडे रानभाज्या विकायला ठेवल्या होत्या. फळफलावळ आणि नेहमीच्या भाज्या वगैरे होत्याच. इथल्या रानातले मुख्य उत्पन्न म्हणजे तेंदूपत्ता आणि महुआ. महुआच्या फुलांपासून दारूही बनवतात. मात्र त्याचा सीझन उन्हाळ्यात असतो. एका ठेल्यावर वाळवलेली महुआची फुलेही दिसत होती. खजूर किंवा मनुकांसारखी त्यांची चव होती. एका कोपऱ्यात काही लोक मोठ्या हंड्यांमध्ये काहीतरी पिण्याचा पदार्थ विकत होते. बघतो तर ती होती सल्फी – म्हणजे ताडाच्या पानांपासून बनवलेली दारू. उत्सुकतेपोटी थोडी चव घेऊन पाहिली. आंबट-गोड आणि थोडीशी झणझणीत अशी काहीशी चव होती. विदेशी मद्याला सरावलेल्या आपल्या जिभेला ही स्थानिक चव रुचण्याची शक्यता तशी कमीच. पलीकडच्या एका बाईकडे भातापासून बनवलेली बियर होती. हा तर प्रकार अजूनच विचित्र होता. आंबट दह्यामध्ये भाताची पेज मिसळावी तशी काहीशी त्याची चव होती. याने पोट एकदम साफ होतं म्हणे. पोट साफ करण्यासाठी जिभेवर एवढे अत्याचार करायची आमची अजिबातच इच्छा नव्हती. एकंदरीत, स्थानिक अपेयपान आम्हा कोणालाच फारसे रुचले नाही. बाजारात एका ठिकाणी काही तरुण कसलासा पारंपरिक कार्यक्रम सादर करत होते. ते बघत आम्ही थोडा वेळ रेंगाळलो आणि बसकडे निघालो.   

बस्तरच्या पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेताना 

कॅम्पसाईटवर परतलो तेव्हा दोन वाजत आले होते. जेवण तयारच होते. पारंपरिक पद्धतीचे भोजन अनुभवायला आम्ही फारच उत्सुक होतो. सगळेजण मनोऱ्याच्या गच्चीवर जमलो. स्थानिक आचारी पानांच्या द्रोणातून एक-एक पदार्थ वाढू लागले. बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी व्यर्ज नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. आजच्या मेनूमध्ये बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे त्यातल्या त्यात शहरी लोकांना खायला जमतील असे पदार्थ होते. शिवाय एक चिंचेची आंबट-गोड चटणीही होती. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला. सगळेच पदार्थ चविष्ट होते. बांबूच्या मोडांची करी तर फारच छान होती. थोड्या वेळात एक मुलगी एक लाल रंगाची अजून एक चटणी घेऊन आली. हीच ती बस्तर मधली प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी. सुरुवातीला माझा विश्वासच बसेना. मग जीतने चक्क रानातून शोधून आणलेले मुंग्यांचे घरटेच दाखवले. असंख्य मुंग्या आणि त्यांची अंडी एका पानावर उन्हात वाळवत स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूस ठेवलेली होती. ती संध्याकाळच्या चटणीची पूर्वतयारी असावी. शाकाहारी असल्याने मी चटणी खाऊन बघण्याचा प्रश्नच नव्हता. इतरांनी मात्र मनसोक्त आस्वाद घेतला.

वाळवायला ठेवलेल्या लाल मुंग्या 
जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ विसावलो. मग आवरून जगदालपूरकडे निघालो. पुढचा कार्यक्रम होता बस्तर मधला पारंपरिक दसरा बघणे.


बस्तर दशेरा - एक अद्वितीय लोकोत्सव

अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल तर दुधात साखर. बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. बस्तर दशेरा मात्र संपूर्ण वेगळा आहे. रामाने वनवासातली दहा वर्षे दंडकारण्यात, म्हणजेच आजच्या बस्तरमधल्या रानात, व्यतित केली असली तरी इथल्या दसऱ्याच्या उत्सवाचा रामायणाशी काहीच संबंध नाही. या उत्सवाचे मूळ इथल्या इतिहासात आहे. या संपूर्ण प्रदेशावर काकतीय राजांचे राज्य होते. काकतीय राजे मूळचे तेलंगणातील वारंगळचे. दिल्लीच्या सुलतानशाहीने त्यांचा पाडाव केल्यानंतर तत्कालीन राजा आपल्या कुटुंबासोबत इ.स. १३२४ मध्ये दंडकारण्यात पळून आला. अत्यंत घनदाट आणि दुर्गम अरण्याने वेढलेल्या त्या प्रदेशात त्याने आपले राज्य स्थापले. सोबत त्याने आपली कुलदेवता आणली, तीच दांतेश्वरी. काकतेय राजांनी या दुर्गम प्रदेशावर १९४७ पर्यंत राज्य केले. या काळात राजांनी आणलेली वैदिक संस्कृती आणि स्थानिक आदिवासी संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडून आला. बस्तर दशेरा म्हणजे याचेच फलित होय.  

बस्तरच्या वेगवेगळ्या गावांतून जमलेले लोक आणि त्यांच्या ग्रामदेवता 

या उत्सवाची सुरुवात झाली १५ व्या शतकात, जेव्हा काकतीय राजे पुरुषोत्तम देव जगन्नाथपुरीहून रथावर आरूढ होण्याची दैवी परवानगी घेऊन बस्तरला आले. ती घटना साजरा करण्याची मग प्रथाच पडून गेली. अनेक स्थानिक परंपरा मग या उत्सवाशी जोडल्या गेल्या. हा उत्सव एकूण ७५ दिवस चालतो. श्रावण अमावास्येला, जिला हरियाली अमावस म्हणतात, या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी रथ बांधण्यासाठी रानातून लाकूड आणले जाते. या प्रथेला म्हणतात पटजत्रा. मग रथांचे बांधकाम, सजावट, वगैरे कामं वेगवेळ्या जमातींचे लोक करतात. उदाहरणार्थ, बेडा उमरगांव गावचे सुतार दुमजली रथ बांधतात तर कारंजी, केसरपाल, आणि सोनाबल गावचे लोक रथ ओढण्याचे दोरखंड वळतात. पोटनार गावचे मुंडा लोक लोकगीते गातात. या सगळ्या प्रथा गेली कित्येक शतके अखंडित सुरु आहेत. एकदा रथाचे बांधकाम झाले की नवरात्रीच्या सुमारास रथपरिक्रमा सुरु होते. पहिल्या दिवशी म्रिगन जमातीतल्या एका लहान मुलीला देवीस्वरूप मानून तिच्याकडून परिक्रमा सुरु  करण्याची आज्ञा घेतली जाते. या प्रथेला काछ्न गाडी म्हणतात. मग देवीची मूर्ती रथामध्ये बसवून रथ जातात. त्यादरम्यान आसपासच्या प्रदेशांतले असंख्य लोक त्यांच्या स्थानिक देवतांना घेऊन जगदालपूरला येतात. मुख्य रथांच्या आजूबाजूने आपल्या देवतांना फिरवतात. सारे वातावरण मांगल्याने आणि उत्साहाने भरलेले असते. प्रत्येक जमातीचा पारंपरिक पोशाख, त्यांच्या देवतांच्या विशिष्ट मूर्ती, त्यांचे लोकसंगीत या सगळ्याचे अनोखे प्रदर्शन या उत्सवात घडते.

पारंपरिक वाद्ये 

दुपारच्या पारंपरिक जेवणानंतर आम्ही आजूबाजूचे अजून दोन-तीन धबधबे बघितले आणि संध्याकाळी सातच्या सुमारास जगदालपूरला पोहोचलो. शहराच्या मध्यवर्ती भागात दांतेश्वरी मंदिर आहे. आम्ही आत जाऊन दर्शन घेऊन आलो. सगळा परिसर गर्दीने गजबजलेला होता. मंदिराच्या बाहेरील चौकात  एक फुलांच्या माळांनी सजवलेला भलामोठा दुमजली रथ उभा होता. रथावर शिरोभागी देवीची मूर्ती स्थानापन्न केली होती. रथाची रचना साधीच होती. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या रचनेत कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता. केवळ लाकडाने बांधलेला तो प्रचंड रथ ओढण्याचे काम मारिया जमातीतले जवळपास ४०० लोक अत्यंत भक्तिभावाने करत होते. एकदा ओढायला सुरुवात केली की काही मीटर अंतर रथ पुढे जाई आणि थांबे. मग माणसे बदलली जात. मग पुन्हा हाईसा म्हणत ओढायला सुरुवात. त्याशिवाय आजूबाजूच्या गावांतून आलेले लोक त्यांच्या ग्रामदेवतांना लहान पालख्यांवर बसवून फिरवत होते. या पालख्या अत्यंत वेगात पळवल्या जातात. त्यांना पळवणारे कुठल्याशा धुंदीत असतात. या पालखीच्या खालून जाणे भाग्याचे मानले जाते. वेगात पाळणाऱ्या पालख्या, त्यांच्या खालून जायचा प्रयत्न करणे स्थानिक तरुण, त्या चढाओढीत होणारी पडापड, असे सगळेच दृश्य गमतीशीर होते. पालख्यांच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला आम्हाला जीतने आधीच दिला होता. पालखीचा दांडा फारच जोरात लागतो म्हणे. आम्ही बापुडे सुरक्षित अंतर ठेवून तो सारा सोहळा पाहत होतो आणि फोटो काढत होतो.

स्थानिक ग्रामदेवतांच्या पालख्या 
फुलांच्या माळांनी सजवलेला रथ 

दोनेक तास रथसोहळा पाहिल्यानंतर आम्ही जेवायला निघालो. उपहारगृह तसे शहराच्या मध्यवर्ती जागेपासून लांब होते. तिथे आमचे आरक्षण आधीच केलेले होते. यथावकाश जेवण उरकून आम्ही बाहेर पडलो. शहराच्या मध्यवर्ती भागाकडे आलो आणि बघतो तर काय, सगळीकडे वीज गेलेली, दुकाने बंद केलेली, आणि जणू सगळे शहर रस्त्यावर लोटलेले! हा प्रकार काय आहे हे कळेचना. इतक्यात समोरून मघाशी पाहिलेला तो महाकाय रथ अत्यंत वेगात पुढे येताना दिसला. सुमारे हजार-एक जण तो रथ अक्षरशः पळवत होते. आजूबाजूचे लोक चित्कारत त्यांना प्रोत्साहन देत होते. एवढ्या अंधारात कसे काय पळवत असतील देव जाणे! आम्ही सगळे स्तिमित होऊन तो प्रकार पाहत होतो. मग जीत म्हणाला, हा रथ चोरीला जातो आहे! त्याची कथा सुद्धा गमतीदार होती. जेव्हा हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा प्रत्येक जमातीला काही ना काही काम मिळाले. पण माडिया जमातीला काहीच काम मिळाले नाही. म्हणून त्यांनी एका रात्री देवीचा रथच चोरून नेला. अखेर खुद्द राजाला त्यांच्याकडे जाऊन रथ परत करण्याची विनंती करावी लागली. बऱ्याच वाटाघाटीनंतर राजाला त्या जमातीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि मगच रथ मंदिरात परत आला. आता ही घटनाही परंपरेचा एक भाग बनली आहे. रथ चोरीला जाताना मुद्दामहून सगळ्या शहरातले दिवे घालवले जातात. सगळे व्यवसाय-धंदे बंद केले जातात. सारे शहर रथ चोरीला जाताना बघते आणि ‘चोरांना’ प्रोत्साहनही देते! 

अंधारात रथ ओढणारे लोक 

उत्सवाची सांगता ‘मुरीया दरबार’ ने होते. यात राजा सगळ्या जमातींच्या नेत्यांना भेटतो, त्यांच्या मागण्या ऐकतो आणि काही पूर्णही करतो. आजही हा परंपरागत दरबार भरतो. राजाच्या जागी छत्तीसगढचा मुख्यमंत्री लोकांच्या मागण्यांचे निराकरण करतो. परंपरेला मिळालेली ही आधुनिकतेची जोड प्रशंसनीयच म्हणायला हवी. 

थोडा वेळ शहरात घालवून आम्ही मुक्कामाच्या जागेकडे निघालो. आमचा मुक्काम तीरथगढ धबधब्याच्या जवळील सरकारी हॉटेलवर होता. आता झोप अनावर होत होती. हॉटेलवर पोहोचताच निद्राधीन झालो. 

तीरथगढ धबधब्यावरील रम्य पहाट

पहाटे साडेसहाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. उठून बाहेर पाहतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली गर्द हिरवाई! रात्री इथे पोहोचलो तेव्हा अंधारात काहीच कळले नव्हते. आता दिवसाउजेडी लक्षात येत होते की आम्ही कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाच्या आत आलो आहोत. नुकताच सूर्योदय झाला होता. कोवळ्या उन्हात गवतावरचे दवबिंदू चकाकत होते. वातावरण आल्हाददायक होते. तीरथगढ धबधबा तिथून अगदी हाकेच्या अंतरावर होता. जीत म्हणाला, चला सगळे धबधब्यावर जाऊ. आत्ता गर्दी अजिबात नसेल आणि मनसोक्त फोटो काढता येतील. काही जण अजून साखरझोपेत होते. ते उठायची वाट न पाहता आम्ही सात-आठ जण कॅमेरा घेऊन लगेचच जीतसोबत निघालो. पाचेक मिनिटांतच धबधब्याचा ध्रोंकार ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने जणू वातावरणातच काहीशी उर्जा निर्माण केली होती. पर्यटन विभागाने धबधब्याच्या परिसराबाहेर एक तिकीट खिडकी आणि गेट उभारले होते. बाजूलाच वाहनतळ होता. आत्ता पहाटेच्या वेळी तिथे शुकशुकाट होता. आजूबाजूच्या लहान-सहान दुकानांतले लोक नुकतेच उठून धंद्याची तयारी करायला लागले होते. गेट उघडेच होते आणि तिकीट खिडकीवरही कोणीच नव्हते. आम्ही सरळ आत शिरलो. आता पाण्याचा आवाज चांगलाच तीव्र झाला होता. समोर खोल दरी असावी असे भासत होते. आम्ही धबधबा वरच्या अंगाने बघणार आहोत हे तेव्हा उमजले. 


आवेगात कोसळणारा तीरथगढ धबधबा 

थोडं पुढे गेलो आणि डाव्या अंगाने जोमात वाहत येणारा एक प्रवाह दिसला. त्याच्या पाण्याने आजूबाजूला बरीच डबकी तयार झाली होती. ती पार करून आम्ही दरीच्या जवळ गेलो. एकेका पावलागणिक धबधब्याचे टप्पे नजरेस पडू लागले. डावीकडून येणारा प्रवाह वेड्या आवेगात कड्यावरून खाली झेपावत होता. पांढऱ्या शुभ्र धुमाळांना कोवळ्या उन्हाने सोनेरी छटा बहाल केली होती. काही मिनिटांपुरती मिळालेली ती छटा वाहणारे पाणी मोठ्या दिमाखात मिरवत होते. पाण्याच्या वेगाने त्या उभ्या कड्याला पायऱ्या पडल्या होत्या. त्यांच्यावरून खेळत आणि उड्या मारत ते पाणी समोरच्या निमुळत्या दरीत कोसळत होते. तिथून पुढे वाटवळणे घेत तो प्रवाह दरीला चिरत पुढे जात होता. हीच कांगेर नदी आणि समोर दिसणारी दरी म्हणजे तिचे खोरे. दरीवर हलकेसे धुके पसरले होते. उगवत्या सूर्याची केशरी किरणे त्या धुक्याच्या दुलईला घालवण्याचा आटापिटा करीत होती. पण गजर बंद करून पाच मिनिटे अजून असं म्हणत झोपणाऱ्या आपल्या सगळ्यांसारखी ती दरीही जणू धुक्याची दुलई ओढून घेत होती. नदीच्या दोन्ही काठांनी गच्च रान भरले होते. धुक्याची दुलई धरून ठेवण्यात त्या वनराईचा हातखंडा होता. धबधबा वाहतच होता. दिवस असो वा रात्र, उन्हाळा असो वा हिवाळा, जोपर्यंत अंगात जोम आहे तोपर्यंत वाहायचे हा त्याचा स्थायीभाव. त्या निवांत भूदृश्यात खळखळणारा धबधबाच तेवढा गतिमान होता.

दरीवर पसरलेली धुक्याची दुलई 

मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. थोडा वेळ कॅमेऱ्यासोबत खेळून मी बाजूच्या एका दगडावर विसावलो. समोरचे दृश्य नुसते निरखत राहिलो. उंचावरची जागा, वाहते पाणी, उगवता किंवा मावळता सूर्य, गर्द वनराई, या गोष्टींकडे मी साहजिकच आकर्षित होतो. मनाला एक वेगळीच शांतता मिळते. नेहमीच्या धकाधकीतला कोलाहल कुठेतरी गुडूप होतो. काहीशी वेगळीच उर्जा मिळाल्यासारखं वाटतं. माझी जणू ब्रह्मानंदी टाळी लागली होती. तेवढ्यात जीतने हाक मारली आणि माझी तंद्री भंगली. पावणेआठ वाजत आले होते. धबधबा अजून खालच्या बाजूने पहायचा बाकी होता. वरून इतके मोहक दिसलेले ते दृश्य आता खालच्या बाजूने कसे दिसेल याची उत्सुकता मनात दाटली होती. लगबगीने आम्ही तिथून निघालो. 


पायऱ्यांवरून दिसणारा धबधबा 

आम्ही आत शिरलो त्या गेटच्या उजव्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. आम्ही तिथून खाली उतरू लागलो. उजव्या हाताला डोंगरकडा आणि डाव्या हाताला गर्द झाडीने व्यापलेली दरी अशी ती वाट होती. थोड्या अंतरातच पायऱ्या लागल्या. दरीत घुमणारा धबधब्याचा आवाज आता अजूनच तीव्र झाला होता. काही अंतरातच पायऱ्यांची ती वाट एका मोकळ्या बिंदूवर आली. इथून ती वाट यू-टर्न घेऊन आणखी खाली उतरत होती. त्या बिंदूवर येऊन पोहोचलो आणि धबधब्याचा तो प्रचंड ओघ नजरेच्या टप्प्यात आला. वरून दिसलेला पाण्याचा तो प्रवाह हाच का असा प्रश्न थोडा वेळ पडला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाने त्या प्रवाहाचा आवेग कैक पटींनी वाढला होता. त्या चुनखडी खडकाला पडलेल्या पायऱ्या जणू त्या शुभ्र धुमाळांना खेळवत होत्या. तिथून काही फोटो काढून आम्ही अजून खाली उतरलो. 

आता आम्ही धबधब्याच्या बरोबर समोर आलो होतो. इथला खडकाळ परिसर अगदीच निसरडा झाला होता. लहान-मोठी पाण्याची डबकी तयार झाली होती. एक-दोन ठिकाणी दगडी पूल बांधून सरकारने पर्यटकांचे चालणे थोडे सोयीस्कर केले होते. आम्ही त्यावरून वाट काढून पुढे गेलो. इथे काही तुरळक गर्दी होती. काही लोक पाण्याच्या प्रवाहात बसून मस्त डुंबत होते. काही जण नुसतेच फोटो काढत होते. उजव्या हाताला एक लहानसा उंचवटा दिसत होता. धबधब्याचे पाणी त्याच्या दोन बाजूंनी वाहत होते. तिथून फोटो छान येईल म्हणून मी त्यावर चढलो. तशा वर जायला पायऱ्या वगैरे होत्या. पण सगळीच वाट फार निसरडी झाली होती. काळजीपूर्वक वर गेलो. वर एक लहानसे शिवमंदिर होते. त्याच लालसर दगडात बांधलेले ते मंदिर त्या भूदृश्यावर फारच उठून दिसत होते. समोरून वाहणारा धबधबा, आजूबाजूची गर्द वनराई, पाण्याच्या आवाजाने भारलेला आसमंत, अशा वातावरणात कोणाच्या मनात अध्यात्मिक भावना येणार नाहीत? मंदिर अगदी लहानसेच होते. नित्यपूजेत नव्हते तरी पिंडीवर दोन-चार फुले वाहिलेली दिसत होती. मंदिराच्या प्रांगणातून धबधब्याचा तो प्रवाह एखाद्या पांढऱ्या चादरीसारखा दिसत होता. दूरवर उजव्या कोपऱ्यात प्रवाहाची आणखी एक लपलेली धार दिसत होती. अगदी वरच्या टोकाला मुंगीएवढी माणसे खाली डोकावताना दिसत होती. हा तोच बिंदू जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो. थोडा वेळ तिथे फोटोग्राफी करून मी खाली उतरलो. 

शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर तीरथगढ धबधबा  

पाण्यात डुंबायचा मोह काही आवरत नव्हता. ग्रुपमधल्या न भिजणाऱ्या लोकांकडे कॅमेरा सुपूर्द करून मी आणखी ३-४ जणांसोबत सरळ एका दगडावर जाऊन बसलो. थंड पाणी अंगावरून गेले आणि एक सुखद शिरशिरी जाणवली. यासम अनुभूती जगात कोणती नसेल. सुरुवातीला कुडकुडणारे शरीर एकदा त्या तापमानाला सरावले की तिथून उठणे मुश्कील होऊन जाते. काही क्षण असाच पडून राहिलो. उगाच सोबतच्या लोकांसोबत मस्ती करायची बिलकुल इच्छा होत नव्हती. ते केवळ माझे आणि निसर्गाचे कनेक्शन होते! तेवढ्यात हातवारे करत बाहेर बोलावणारा जीत दिसला. पाण्याच्या आवाजापुढे त्याचा आवाज काय ऐकू येणार? रानातल्या ट्रेकला निघायचे होते म्हणून तो घाई करत होता. मी बापुडा काहीशा अनिच्छेनेच उठलो आणि सगळ्यांसोबत परत जायला निघालो. त्या दरीतल्या गर्द वनराईतून फिरण्याची ओढही मनाला लागली होती. नुकत्याच उघडलेल्या बाहेरच्या टपरीवर गरमागरम चहा घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. तीरथगढ धबधब्याने त्या दिवशीची सकाळ मनपटलावर कायमची कोरून ठेवली होती. 

पांढऱ्या भिंतीसम वाटणारा धबधबा 
      

कांगेर खोऱ्याचे अरण्यवैभव

तीरथगढ धबधब्यावरची ती रम्य पहाट अनुभवल्यानंतर कांगेर खोऱ्यात भटकायची उत्सुकता अजूनच ताणली गेली होती. आजवर पश्चिम घाटातली आणि हिमालयातली वने पाहिली होती. रणथंभोर आणि ताडोबाच्या निमित्ताने मध्य भारतातली पानझडी वनेदेखील अनुभवली होती. पण बस्तरमधले मिश्र पानझडी प्रकारचे वन कधी अनुभवले नव्हते. कांगेर खोरे हे ओदिशा आणि छत्तीसगढच्या सीमेलगत, जगदालपूरपासून २७ किमी अंतरावर स्थित आहे. साधारण ३०० ते ७०० मीटर उंचीच्या टेकड्यांनी वेढलेल्या या भागात विपुल वनसंपदा आहे. मध्य भारतातली शुष्क पानझडी वने आणि पूर्व भारतातली साग-साल वृक्षांनी नटलेली दमट पानझडी वने यांच्या मध्यभागात हे वन असल्याने येथे दोन्ही प्रकारची जैवविविधता आढळते. खरे तर भारतातल्या काही अस्पर्शित राहिलेल्या वनांपैकी हे एक वन मानले जाते. तीरथगढ धबधब्यासोबत इथल्या चुनखडकातल्या नैसर्गिक गुहा हे एक मुख्य आकर्षण आहे.      

भातशेतीच्या कडेने ट्रेकला सुरुवात 

हॉटेलवर आन्हिकं उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. बसने एका शेताजवळ आणून सोडलं आणि मग आमची वनभ्रमंती सुरु झाली. जीतने आम्हाला रस्ता दाखवायला स्थानिक तरुणांची एक टीमच तयार केली होती. आमच्या ग्रुपसोबत इतरही काही जण होते. साधारण ८-१० किमीचा रस्ता होता. भातशेतीच्या कडेकडेने आम्ही चालू लागलो. बाजूने एक ओहोळ गुणगुणत होता. वातावरण तसं स्वच्छ होतं. पावसाचे दिवस असल्याने थोडा दमटपणा हवेत होता. हळूहळू शेती मागे पडली आणि आम्ही रानात शिरलो. एव्हाना इवलासा वाटणारा तो ओहोळ आता एका खोडकर ओढ्यात रुपांतरीत झाला होता. हा ओढा वाट्टेल तसा खडकांना कापत नि धरणीला चिरत गर्द झाडीतून सुसाट वाहत चालला होता. आमची सारी भ्रमंती आता याच्याच साथीने होणार होती. वाट उताराची होती. दोन्ही बाजूंनी गच्च गवत वाढले होते. इथे जळवा नाहीत ना याची दोन-तीन वाटाड्यांकडून खातरजमा करून घेतली. मागच्या वेळचा तांबडी सुर्ला मधला अनुभव गाठीशी होताच. थोड्या वेळातच पाण्याचा आवाज वाढल्यासारखा वाटला. काही पावलं पुढे गेलो नी पाहतो तर काय, गर्द रानाच्या मधोमध एक निळा-सावळा डोह दिसत होता. आजूबाजूच्या खडकांवरून ओढ्याचे पाणी त्यात खिदळत उड्या घेत होते. काठाने वाढलेले प्रचंड वृक्ष आपल्या दाट पर्णसंभाराचे छत्र त्या डोहावर अलगद धरून उभे होते. काही वेगळीच गूढ शांतता तिथे भरून राहिली होती. ग्रुपमधले काही सेल्फी ट्रेकर्स तिथे नुसते फोटो काढण्यात आणि एकमेकांवर पाणी उडवण्यात मग्न झाले होते. त्यांच्या कलकलाटाचा वैताग येत होता. पण काय करणार, आपलेच दात नी आपलेच ओठ. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोन क्षण माझ्या निसर्गाराधनेत मग्न झालो. काही फोटो काढून, आवाज करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून, पुढे निघालो. 

रानाच्या मध्यातला डोह 

गर्द वनराईतून खळाळत जाणारा ओढा 

रानातले एकलकोंडे वठलेले झाड 
पुढची वाट काहीशी सपाट होती. हाच ओढा वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटत होता. कधी त्याच्या काठाने, कधी त्याला पार करत, कधी वर चढत, तर खाली उतरत आम्ही पुढे चाललो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने रान अगदी तृप्त दिसत होतं. झाडांच्या पर्णसंभाराची गडद हिरवी छटा माथेरान-भीमाशंकरच्या सदाहरित वनांची आठवण करून देत होती. तर मधेच दिसणारी बांबूची बेटे पानझडी वनांचा आभास निर्माण करत होती. मधेच जमिनीचे काही सपाट तुकडे भाताच्या रोपांनी भरलेले दिसत होते. त्या रोपांची पोपटी छटा जणू तिथल्या भूदृश्याच्या रंगपेटीतला हरवलेला रंग भरून काढत होती. आता ओढ्याचे पात्र जरा मोठे झाल्यासारखे वाटत होते. एका ठिकाणी पाणी दहा-बारा फुटांवरून खाली कोसळत होते. जणू एक लहानसा धबधबाच! आतापर्यंत पाहिलेल्या धबधब्यांच्या तुलनेत हे कोसळणारे पाणी म्हणजे लिंबू-टिंबूच. मात्र तिथे दगडांची रचना मस्त बैठक मारून बसायला अगदी अनुकूल होती. आम्ही तिथेच बसकण मारली. ग्रुप फोटो वगैरे काढला, थोडीफार खादाडी केली, आणि मग पुढे निघालो. आता ट्रेक अंतिम टप्प्यात आला होता. अचानक तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता आम्ही एका अरुंद घळीत येऊन पोहोचलो. ओढ्याचे पाणी इथून भरधाव वेगाने वाहत होते. त्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. एका क्षणी वाटले, स्वार व्हावे या मुक्त प्रवाहावर, तो जिथे घेऊन जाईल तिथवर जावे. अगम्य प्रदेश बघावा. अनुभवांची पोतडी अजून श्रीमंत करावी. आणि मग परत नवा प्रवाह शोधावा! 

लिंबू-टिंबू धबधबा 

इतक्यात अंगावर दोन-चार थेंब पडल्यासारखे वाटले. वाटलं ओढ्याचंच पाणी आहे. पण तेवढ्यात वर ढगांची गर्दी झालेली दिसली. नशिबाने अजूनतरी आम्ही गुडघ्यांच्या वर कोरडे होतो. आणि आता ट्रेक जवळपास संपलाच असताना ओले होण्याची फारशी उत्सुकता नव्हती. शिवाय कॅमेरा सोबत होताच. मग लगबगीने त्या घळीतून वर आलो. काही पावलं चाललो काय नि एक ओळखीचा वाहनतळ दिसू लागला. हाच सकाळी पाहिलेला तीरथगढ धबधब्याच्या बाजूचा वाहनतळ! हात्तिच्या! एवढाच ट्रेक? दहा कसले जेमतेम पाच किमीसुद्धा अंतर भरले नसेल! मग जीत म्हणाला, लोकांना मुद्दाम वाढवून सांगावे लागते अंतर. त्यांना फेसबुकवर टाकायला सोपे जावे म्हणून! आता छत्तीसगढ मध्ये त्याला आमच्यासारखी सह्याद्रीतल्या गडवाटा तुडवणारी लोकं कुठे आलीत भेटायला! त्याच्या या तथाकथित दहा किमीच्या ट्रेकची खिल्ली उडवणारे आम्ही आणि सतरा वेळा घसरून पडलेले, कुठे-कुठे चिखल लागलाय ते पुनःपुन्हा बघणारे आणि कपाळावरचा घाम पुसणारे ग्रुपमधले इतर जण अशी आभासी वर्गवारी तिथे झाली होती. ट्रेक लहानसा असला तरी खोऱ्यातल्या रानाचे सुंदर दर्शन घडले होते. 

अरुंद घळीतला जोमात वाहणारा ओढा 

ओढ्याचे काहीसे शांत रूप 
हा बस्तरमधला शेवटचा दिवस होता. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानात तशा बघण्यासारख्या अजून अनेक जागा आहेत. पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या नैसर्गिक गुहा त्यांपैकीच एक. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तिथे पाणी असल्याने जाणे शक्य नव्हते. त्याव्यतिरिक्त काही दुर्गम भागात जाणारे ट्रेक मार्गही आहेत. पण ही सहल तशी लहानच असल्याने हे सगळे काही बघता येणे शक्य नव्हते. पुढच्या वेळी जास्त वेळ काढून यायचे आणि रान यथेच्छ अनुभवायचे असे मनाशी ठरवून टाकले. जेवण करून आम्ही जगदालपूरला आलो. दशेराचे आणखी काही विधी चालू होते. ते बघण्यात संध्याकाळ घालवली. मग रात्रीचे जेवण उरकून रायपूरकडे रवाना झालो. बस्तरच्या या सहलीने आपल्या शेजारच्या राज्यातल्या एका विविधरंगी-विविधढंगी प्रदेशाचे दर्शन घडले घडवले होते. इथले धबधबे, समृद्ध वनसंपदा, आणि तितकेच समृद्ध लोकजीवन अनुभवायला मिळाले होते. अनुभवांच्या पोतडीत आणखी एक अत्तरकुपी दाखल झाली होती. तिच्या गंधतृप्तीने मुंबईच्या धकाधकीला सामोरं जायची नवी उर्जा मिळाली होती. 



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...