https://www.maayboli.com/node/19111
बराच गाजावाजा/दंगा, मनात मांडे खात योजलेली लेह सफर रद्द झाली. एव्हडी मोठी आपत्ती कोसळली असता पर्यटक म्हणुन तिथे जाणे मनाला पटले नाही. मग शिमल्याहून इशान्येला असलेल्या सांगला-कल्पा ह्या दर्यांतून (किन्नौर जिल्हा - मुख्य ठिकाणः रिकँग पिओ) जात पुढे सुम्डो नावाच्या भारत-चीन सीमेपासून पश्चिमेला वळत लाहौल-स्पिती दर्यातून (काझा-कुमझुम पास मार्गे) मनालीला यायचे असा बेत केला. प्रचंड पावसाने सांगलाच्या पुढचा एक पूल (नाको जवळचा) वाहून गेलेला. मी सांगला सोडले तेव्हा तो रस्ता सुरु व्हायची शक्यता होती पण मी घेउन गेलेली गाडी (मारुती स्विफ्ट) तिथे झालेल्या चिखलातून जाणार नाही असे तिथल्या स्थानिक वाहनचालकांनी सांगितले. तरी पाओरी नामक गावातून पुढे १०-१५ किमी गाडी ताणलीच. अर्थात लवकरच लक्षात आले की बर्यापैकी जमिनीपासून उंच (ग्राउन्ड क्लीअरन्स) आणि थोडी दणकट गाडीच जाउ शकेल. त्यातच चाकरीच्या ठिकाणाहून दोन-चार फोन येउन गेले होते. एक काम उपटले होते ज्यासाठी मी परत येउ शकेन का असं दोन-चारदा विचारुन झालं. अश्या अनेक कारणांनी परतलो. परतल्या परतल्या कामं सुरु झाल्याने फारसं प्रवासवर्णन लिहिण्याचा उत्साह नाहिये.
अनेक वर्षांनी मी पहिल्यांदाच आणखी एका सहप्रवाशाबरोबर प्रवासास गेलो होतो. मागल्या पाच-सात वर्षात एकट्यानेच भटकत होतो. हा माझा सहप्रवाशी माझा खूप चांगला मित्र पण आहे. पण तरीही, सवयीमुळे असेल किंवा माझ्या प्रकृतीमुळे असेल, एकट्याचा प्रवास मी 'मिस' केला. माझे एकटे भटकणे हे 'माझे' असते. तिथे मी स्वत:शीच बडबडत असतो. भांडतो, चिडतो, हसतो वगैरे वगैरे. तो प्रवास 'माझा' होतो. एक प्रकारे ही भावना मी ह्यावेळी गमावली. थोडक्यात प्रवासात सहप्रवासी म्हणुन मी बिनकामाचा आहे.
एक प्रकारे 'टुरिस्टी' प्रवास झाला. सगळं सुशेगात. बडवलेल्या
रस्त्यांवरुन. पण तरिही आवडला मला. हिमालयात नेहेमीच एक शांतता लाभते.
ह्यावेळीदेखील ह्याला अपवाद नव्हता.
साधारण माझा प्रवास असा होता:
मिरज-पुणे-नाशिक-अहमदाबाद (व्हाया सापुतारा-सुरत-बरोदा)-जयपूर (व्हाया उदयपूर्-चित्तौड)-कल्का
कल्का पासून पुढे हिमालयात शिरलो. कसौलीत थोडा वेळ घालवून कुफ्री
(सिमल्याहून २० किमी पुढे) मुक्काम केला. दुसर्या दिवशी नारकंड्याजवळ हातु
पीक चडून, थानेधार गावातून व्हाया रामपूर सराहनला मुक्काम केला. सराहनला
सकाळ तिथल्या स्थानिक सरकारी प्राथमिक शाळेत घालवून (एक भाषण पण ठोकलं
) सांगल्याला गेलो. सांगल्यात एक दिवस राहिलो. तिथून छितकूल नावाच्या चीन
सीमेलगतच्या (म्हणजे सीमा चांगली ५०-६० किमी आत आहे. पण छितकूल शेवटचे गाव)
गावात एक दिवस राहिलो. मग खाली उतरुन कल्पा नावाच्या गावात दोन दिवस
राहिलो. इथून किन्नौर कैलासचे थेट दर्शन होते. मग परत पुण्याला तीन दिवस
मॅराथॉन ड्रायव्हिंग करत (रामपूर-पानीपत-उदयपूर-पुणे) पोचलो. http://himachaltourism.gov.in/HimachalIT/image.axd?picture=2008%2F9%2FHi...
ह्या दुव्यावर तुम्हाला हिमाचलचा नकाशा मिळेल. शिमल्याहून इशान्येला
नारकंडाच्या दिशेने बघितलेत तर मी केलेला प्रवास (व काझा-कुमझुम मधून
योजलेला प्रवाससुद्धा) दिसेल. पुढच्या वर्षी बोलेरो सारखी एखादी गाडी घेउन
पुन्हा हा मार्ग नक्की करेन.
ह्या प्रवासात मी व्हिडिओ शूटिंग बरेच केले. फोटो फारसे काढले नाहीत. जे काही थोडेफार काढले त्यातले बरे दिसणारे इथे पोस्टतोय.
हिमालयाचे पहिले दर्शन - कसौली:
धुक्यातले हातु शिखर:
सतलज नदी. शिमल्याहून पुढचा बराचसा प्रवास सतलजच्या (वा बास्पा ह्या सतलजच्या उपनदीच्या काठानेच होतो):
तानीजुब्बर लेक. हिमालयाच्या डोंगरा-दर्यातून असलेल्या अनेक तळ्यांपैकी एक बारकुसा तलावः
देवभुमी सांगला. सांगल्यातली लोकं पुर्वी स्वतःला देव व मानव
ह्यांच्यामधली साखळी समजत. पर्वमध्ये (एस एल भैरप्पा) देवभुमी म्हणुन ज्या
प्रदेशाचा बरेचदा उल्लेख येतो तो हाच:
सांगल्याला जाताना असलेला डोंगरातला बोगदा:
सांगल्याच्याही पुढे ३० किमीवर असलेले (आणि जेमतेम एक गाडी जाईल अश्या
छोट्या आणि प्रचंड चढाच्या रस्त्याने वर जावे लागणारे) छितकूल गाव. अतिशय
सुंदर. इथे राहणे एक नितांतसुंदर अनुभव होता.
उंचावरच्या छितकूलमध्ये छोट्या छोट्या तुकड्यात असलेली 'सरसों'ची शेती.
डोंगरातले रस्ते:
कल्पातले देवदारः
किन्नौर कैलासचे शिवलिंग (७०-८० फुटाचा एक उभा दगड आहे ज्याला मानस सरोवरासारखीच परिक्रमा केली जाते. १० दिवसाचा थोडा अवघड ट्रेक आहे. शिवलिंगापर्यंत जायचे असेल तर ४५०० मीटरच्या आसपास चढावे लागते. कल्पातून निघून ४ दिवसात परत येता येते जर स्टॅमिना उत्तम असेल तर). बाजूला किन्नौर कैलाशचे शिखर (६०५० मी उंच). खालच्या प्रकाशचित्राच्या मधोमध एक इंग्रजी व्ही आकाराची जी छोटीशी दरी झाल्यासारखी दिसते आहे तिच्या डाव्या टोकाला एक छोटासा टेंगू दिसून येईल. तेच शिवलिंग. अगदी खालच्या प्रचिमध्ये मी शिवलिंगाच्या भोवती एक लाल गोल काढलाय. फोटो फार सुंदर नाहिये पण प्रत्यक्षात फार सुंदर दिसते ही पर्वतरांग.

आता सांगला-कल्पा-छितकूल हा बर्यापैकी पर्यटक-वर्दळीचा भाग झालेला आहे.
सांगल्यात तर भरपूर हॉटेल्स आहेत. छितकूलमध्ये २-३ बर्यापैकी व ३-४ साधी
हॉटेले आहेत. indiatravels.com टाइपच्या साइट्स चांगल्या गाड्या/राहण्याची
व्यवस्था असलेल्या ट्रिप्स उत्तमपणे आयोजित करतात. विशेष करुन इस्रायली
पर्यटक खूप दिसले.
सांगला-कल्पा किन्नौर ह्या जिल्ह्यात येते ज्याचे मुख्य गाव आहे रिकँग पिओ.
सतलज जल विद्युत निगमची अनेक कामे इथे चालू आहेत. जेपी हायड्रो, हिमाचल
विद्युत निर्माण निगम इत्यादी कंपन्या अशक्य उंचीवर आणि दुर्गम ठिकाणी
धरणे/बोगद्यांची कामे करत आहेत. त्यामुळे पिओ पर्यंतचा प्रवास तसा सुखकर
आहे. पिओ ओलांडले की मात्र थोडा निर्जन भाग सुरु होतो. इथे भौगोलिक
परिस्थिती (विशेषतः सुम्डोच्या पुढे जिथे लाहौल-स्पिती जिल्हा सुरु होतो)
लेहशी मिळती-जुळती व्हायला लागते. नाको पासून मनाली पर्यंतचा रस्ता अतिशय
वेगळ्याच प्रकारच्या वातावरणातून (कोरडी हवा, उंच रस्ते, वाळवंट सदृश माती
इत्यादी) भुभातातून जातो. मला पिओच्या पुढे जाता आले नाही. पण पुढे कधीतरी
नक्की जाईन. ह्या पुढच्या रस्त्यावर तुलनेने कमी हॉटेल्स आहेत. काझा
वगैरेला तर तुरळकच. पण पर्यटकही फार कमी जात असल्याने सोय होउन जाते.
स्वतःबरोबर एखादा टेंट-स्लीपींग बॅग असेल तर कुठेही पडी टाकता येतेच.
आम्ही या महिन्यात ९ दिवसांचा मुंबई - चंदिगड - शिमला - सांगला - कल्पा -
नाको - टाबो - काझा - कुंझुम पास - रोहतांग पास - मनाली - चंदिगड - मुंबई
दौरा केला.
या सगळ्या प्रवासात अतिशय आवडलेली ठिकाणे म्हणजे, छितकुल गाव, कल्पामधुन दिसणारे किन्नौर कैलाश, काझा जवळची पीन व्हॅली आणि कुंझुम ते रोहतांगपास पर्यंतचा चंद्रा नदीच्या काठचा स्पिती व्हॅलीचा प्रवास.
त्यामुळे पिओ पर्यंतचा प्रवास तसा सुखकर आहे. पिओ ओलांडले की मात्र थोडा निर्जन भाग सुरु होतो. इथे भौगोलिक परिस्थिती (विशेषतः सुम्डोच्या पुढे जिथे लाहौल-स्पिती जिल्हा सुरु होतो) लेहशी मिळती-जुळती व्हायला लागते. नाको पासून मनाली पर्यंतचा रस्ता अतिशय वेगळ्याच प्रकारच्या वातावरणातून (कोरडी हवा, उंच रस्ते, वाळवंट सदृश माती इत्यादी) भुभातातून जातो.>>>>अगदी अगदी.
पिओ पासुन नाको पर्यंतचा प्रवास खतरनाक आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.