https://nvgole.blogspot.com/search/label/%22%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%22%20%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A5%A7
महानदीचे मुख
मी १८ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ओरिसात, चिल्का सरोवराच्या कडेकडेने प्रवास केला. ओरिसातील प्रवासास उद्युक्त झाल्यापासून कशीकशी माहिती मिळत गेली, काय काय पाहावेसे वाटू लागले, तिथे काय काय पाहण्यासारखे आहे इत्यादी अभ्यासांचे फलित, तसेच प्रवासात काढलेली प्रकाशचित्रे आणि ओरिसाच्या भौगोलिक, नैसर्गिक व पर्यटनासंदर्भातील वर्तमान स्थितीबाबतच्या माझ्या आकलनाची ही कहाणी आहे. ती चार भागांत पूर्ण लिहावी असा विचार आहे. त्यातलाच हा पहिला भाग.
ओरिसात काय आहे? ओरिसा वादळभूमी आहे. ओरिसा पुरातन मंदिरांची भूमी आहे. ओरिसात सम्राट अशोकाला विरक्तीचा मार्ग सापडला आहे. बुद्ध धम्मातील शांतीसार गवसले आहे. पण यांखेरीज ओरिसात जगातील सर्वात अनोखा नैसर्गिक आविष्कार आहे. तो म्हणजे चिल्का सरोवर. महानदीचे मुख. भारताच्या राजकीय नकाशात ओरिसा ज्या दिशेला, ज्या ठिकाणी आढळून येतो, जवळपास त्याच दिशेला, त्याच ठिकाणी, नैसर्गिक ओरिसाच्या नकाशात चिल्का सरोवर दिसून येते. चिल्का सरोवराची उपग्रहातून काढलेली चित्रे, ओरिसातील जनजीवन, चिल्का सरोवराच्या परिसरप्रणालीवर कशाप्रकारे अवलंबून आहे ते चांगल्या प्रकारे दर्शवतात.
आपण मराठी लोक ओरिसा म्हणतो. तिथले लोक 'उडिशा' म्हणतात. त्यांच्या बोलीभाषेतला 'ड'चा उच्चार 'र'च्या आसपासचा असतो. शिवाय 'स' ला 'श' म्हणायचीही प्रथा आहे. म्हणजे ते 'बडकूल' म्हणतात तेव्हा आपल्याला 'बरकूल' असे ऐकू येते. शिवाय 'उ' च्या जागी बंगाल्यांप्रमाणे 'ओ' म्हणायचीही प्रथा आहे. म्हणून आपल्याला ते ओरिसा म्हणताहेत असे वाटते. तलावाला आपण सरोवर म्हणतो, ते तलावाला 'हृदो' म्हणतात. चिल्का (याचा चिलिका असाही उच्चार प्रचलित आहे) सरोवर तिथले सर्वात मोठे 'हृदो' आहे. मात्र ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 'उडिशा'तील सर्वात मोठे 'मधुर जल हृदो' 'अंशुपा' आहे. हे सरोवर कटक जवळ आठगढ इथे आहे. अर्थातच महानदीच्या कुशीत.
टैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मुखाशी जसे मध्यपूर्वेचे आखात निर्माण झाले, त्याचप्रमाणे ब्रह्मपुत्रा आणि गंगा नद्यांच्या मुखाशी जे मोठे आखात निर्माण झाले ते म्हणजेच बंगालचा उपसागर. गंगेच्या पूर्ववर्ती प्रवाहाने ब्रह्मदेशाचा पश्चिम किनारा घडवला, तर ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणवर्ती प्रवाहाने भारताचा पूर्व किनारा. भारताच्या पूर्व किनाऱ्यास जिथे कठीण कातळ उघडा पडला तिथवर जाऊन जमिनीचे क्षरण थांबले. मग कठीण कातळास उल्लंघून भूमीचा ऱ्हास करणे सागरी प्रवाहांना आणि लाटांना शक्य राहिले नाही. मात्र भूमीतील वेगवती नद्यांचे प्रवाह समुद्रपातळीपर्यंत जलौघांना आणतच राहिले. त्याच कातळांनी ते जलौघ सागरास पावते होण्यापासून रोखले गेले आणि महानदीच्या मुखाशी गोड्या पाण्याचे भव्य सरोवर निर्माण झाले. ते म्हणजे चिल्का. आता निरंतर येणारे जलौघ, ते सरोवर साठवणार तरी किती? शेवटी सरोवराचे पाणी सागरास मिळणे क्रमप्राप्तच होते. ते समुद्राची वाट शोधत गेलेच. ते आहे महानदीचे मुख. चिल्का सरोवराचे मुख. मग याच मुखातून भरतीच्या लाटांनाही सरोवरात शिरण्याचा मार्गच सापडला आणि चिल्का सरोवराचे पाणी खारे झाले.
जगभरातील मोठ्या नद्या जिथे जिथे समुद्रास मिळतात तिथे तिथे मोठाले त्रिभूज प्रदेश निर्माण झालेले दिसून येतात आणि त्या नद्या असंख्य मुखांनी समुद्रास मिळतात. महानदी मध्यभारतातील एक मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. अमरकंटकच्या डोंगरात, विंध्य पर्वतात उगम पावून ती नदी गंधमादन पर्वतश्रेणींतून वाहत वाहत, मैदानात, कटकपाशी उतरते. (कटक पूर्वी ओरिसाची राजधानी होती. ) कटकपाशी महानदी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराकडे झेपावू लागते. त्यातला सगळ्यात दक्षिणेकडील फाटा चिल्का सरोवरात परिणत होतो. अशाप्रकारे महानदीच्या मुखाशी त्रिभूज प्रदेश तर आहेतच, शिवाय साडेअकराशे वर्ग किलोमीटर विस्ताराचे भव्य चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवर उत्फुल्ल होऊन वाहू लागते आणि सागराची वाट शोधते. दोन मुखांशी जाऊन ह्या शोधाचे समापन होते.
उत्तरेचे मुख आहे जुने आणि दुसरे दक्षिणेकडले मुख आहे नवे. इसवी सन २००० पूर्वी हे नवे समुद्रमुख नव्हते. २३ सप्टेंबर २००० रोजी ते उघडण्यात आले. त्याची कहाणी अशी आहे. काळाच्या ओघात जुन्या समुद्रमुखाशी गाळ साठत गेला. मुख अरुंद होत गेले. उथळ होत गेले. मग चिल्का सरोवराची पातळीही उंचावत गेली. गावे पाण्याखाली बुडू लागली. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवू लागली. या समस्येवर इलाज शोधला जाऊ लागला. पुण्याच्या केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक (Central Water and Power Research Station), यांच्या शोधाचे फलित म्हणून असा निष्कर्ष काढण्यात आलेला होता की कायलातील (कायल = lagoon = उडिया भाषेत हृदो) क्षार आणि लाटांचे ओघ (flux), कायलाचे मुख (mouth of the lagoon), मुख्य कायलाच्या जवळ आणल्याखेरीज सुधारणार नाहीत. त्यांच्या, त्रिमिती आकडेशास्त्रीय प्रारूप (3-dimentional numerical prototype) अभ्यासाच्या आधारे, त्यांनी शिफारस केली की १०० मीटर रुंद आणि कायलातील कमीत कमी जल-पातळीच्या २. ५ मीटर खालच्या पातळीवर एक नवे मुख निर्माण करायला हवे. म्हणजे कायलातील क्षारांशाचा ओघ ४०% पर्यंत सुधारेल आणि कायलातील लाटांचा ओघ ४५% पर्यंत सुधारू शकेल. यामुळे कायलातील पर्यावरण-प्रणाली पुनः संजीवित होऊन अपेक्षित क्षारांशाची पातळी -म्हणजेच उन्हाळ्यात उत्तर भागातील क्षारांश लाखात १. ५ भाग- साध्य करता येईल.
यानुसार नवे कायलमुख सिपकुड गावाजवळ २३ सप्टेंबर २००० रोजी समुद्रास खुले करण्यात आले. हे, केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक, पुणे व समुद्र अभियांत्रिकी केंद्र (Ocean Engineering Centre), भारतीय प्रौद्योगिकी संस्था (Indian Institute of Technology), चेन्नई यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली साध्य करण्यात आले. राष्ट्रीय समुद्रतळ-आलेखन संस्था (National Institute of Oceanography), गोवा, यांनी कायलातील परिवर्तनांची देखरेख केली.
२००१ मध्ये चिल्का सरोवरातील बेटांवरची व आसपासची खेडी पुरप्रभावित झाली नाहीत. नंतरच्या दोन-तीन वर्षांत खेकड्यांचे उत्पादन १०-१५ पटींनी वाढले व सरोवरातील क्षारांश दुपटीने वाढला. शिवाय जुन्या समुद्रमुखातून होणाऱ्या क्षीण जलौघापायी, ५०,००० हेक्टर जमिनीवरील खरीफाच्या पीकांचे होणारे नुकसान, नवे समुद्रमुख उघडताच थांबले. ही उपलब्धी चिल्का विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नमूद केलेली आहे.
ओरिसाला जाणार हे ठरल्यावर कधी हा प्रश्न आला. ओरिसातील पर्यटनासाठी ओक्टोंबर ते मे हा काळ योग्य समजतात. मग दिवाळीच्या सुट्ट्यांचा मौसम सोयीचा ठरला. आठ दिवसच मिळत होते. ओरिसातील दक्षिण भाग, जो चिल्का सरोवराकाठी वसलेला आहे तो जास्त प्रगत, जास्त पर्यटकांना आकर्षित करणारा आणि जास्त सोपा आहे. ओरिसाच्या उत्तरेलाही मगरींसाठी प्रसिद्ध असलेले भीतरकणिका अभयारण्य, हत्ती व सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले सिमिलीपाल अभयारण्य, ललितगिरी व रत्नगिरी ही बुद्धांची तीर्थक्षेत्रे, रौप्य कलाकुसरीचे माहेरघर आणि ओरिसाचे पुणे म्हणता येईल अशी सांस्कृतिक राजधानी कटक इत्यादी अनेक प्रवासीप्रिय गोष्टी आहेत. पण उपलब्ध वेळेच्या मर्यादेत कुठल्या तरी एकाच दिशेचा प्रवास अर्थपूर्ण होण्यासारखा होता. म्हणून आम्ही जास्त चोखाळला गेलेला दक्षिणपंथ निवडला.
त्यात ओरिसाला जायचे म्हटल्यावर भुबनेश्वर, पुरी आणि कोणार्क तर पाहायलाच हवे. म्हणून उर्वरित दिवसांत चिल्का सरोवर सर्व बाजूंनी पाहावे असे वाटले. पुढे तप्तपाणीची माहिती समजली. मग त्याचाही समावेश झाला. एव्हाना ऋषीकुलया नदीच्या काठावरील एका पहाडावरच्या तरतारिणी मंदिराबाबतही माहिती समजली होती. मात्र वेळेअभावी तो कार्यक्रम वगळावा लागला. एवढे करूनही सातपाड्याला राहून नावेतून डॉल्फिन्स पाहण्याच्या कार्यक्रमावरही वेळेअभावी पाणीच सोडावे लागले. तरीही सर्वसंमतीने खालील कार्यक्रम निश्चित झाला.
ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची प्रवासीनिवासांची एक मालिका (Orissa Tourism Development Corporation's Hotel Chain) आहे. त्यातील प्रवासीनिवासांना पंथनिवास म्हणून ओळखले जाते. ओरिसा पर्यटन विकास महामंडळाने काढलेल्या "निसर्ग पर्यटन सहलीचा" कार्यक्रम स्वीकारून, आम्ही आठ रात्री आणि नऊ दिवसांचा आमचा ओरिसा पर्यटनाचा कार्यक्रम नक्की केला. यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही भुबनेश्वरला येऊन तिथल्या पंथनिवासात राहणार होतो. त्या दिवशी 'एकम्रा हाट', 'राममंदिर' इत्यादी पाहण्याचा कार्यक्रम होताच. दुसऱ्या दिवशी बरकूलच्या पंथनिवासात पोहोचून जेऊन मग बरकूलच्या जेटीवरून तीन तासांची स्वयंचलित नावेने सफर करणार होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी नारायणी मंदिर, टंपारा सरोवर पाहत पाहत गोपालपूरला जाऊन किनारा बघणार होतो. सकाळी सूर्योदय पाहणार होतो. मग चवथ्या दिवशी तप्तपाणीला जाऊन राहणार होतो. कुण्ड पाहणार होतो. स्नान करणार होतो. तिथले अभयारण्य, हरीणबाग (डिअरपार्क) पाहणार होतो. पाचव्या दिवशी सकाळी चंद्रगिरी पाहून, दुपारी रांभाच्या पंथनिवासात जाऊन राहणार होतो. सहाव्या दिवशी रांभाच्या चिल्का सरोवरात अडीच तीन तासांचा फेरफटका स्वयंचलित नावेने घेऊन मग भुबनेश्वरच्या पंथनिवासात जाऊन राहणार होतो. वाटेत खुर्दारोडवरच्या उदयगिरी व खंडगिरी लेण्या पाहण्याचाही विचार होता. सातव्या दिवशी पुरीच्या पंथनिवासात राहून जगन्नाथाचे दर्शन, किनारादर्शन आणि खरेदीची योजना होती. आठव्या दिवशी सकाळी कोणार्क मंदिर पाहून व दुपारी भुबनेश्वरचे नंदनकानन पाहून आमचा कार्यक्रम संपूर्ण होणार होता. नवव्या दिवशी परतीचा प्रवास होणार होता.
मुक्तेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, लिंगराज मंदिर ही सगळी मंदिरे आसपासच आहेत. लिंगराजमंदिरात फोटोग्राफीस मनाई आहे. सिद्धेश्वर मंदिराला सलग दगडातून कोरलेल्या खिडक्या आहेत. त्या म्हणजे कोरीव खिडकीकलेतील कमालच आहे. नागकन्यांचे स्तंभ आणि भूमितीय आकृत्यांची नक्षी जागोजाग दिसून येते. नागकन्यांची कमनीयता नेत्रदीपक आहे. सिंहाचे हत्तीवर वर्चस्व दाखवणारी शिल्पे दारांवर दिसून येतात. ती बुद्ध धर्मावर हिंदू धर्माने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानली जातात.
बरकूलच्या पंथनिवासाचे कार्यालय म्हणजे एक कौलारू टुमदार बंगला होता. मात्र, आम्ही राहिलो ती इमारत जुन्या प्रकारची सिमेंट काँक्रीटची दुमजली इमारत होती. जिच्या वरच्या मजल्यावर आम्ही राहिलो. उतरायला सरळसोट उतरता जिना दाराबाहेरच होता. जिन्याच्या चौकातून समोरचे धाब्याचे घर व्यवस्थित दिसे. उपाहारगृह दूरवर होते. त्याच्यामागे वरकरणी तंबूसारखी दिसणारी सिमेंट काँक्रीटची टुमदार घरे ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची सुट्टीकालीन घरे (हॉली-डे होम्स) होती.
मात्र सकाळी जेव्हा आम्ही जलप्रवासाला बाहेर पडलो होतो तेव्हा, सूर्य तळपत होता. ऊन लागू नये म्हणून आम्ही डोक्याला फडकी ओली करून बांधलेली होती. त्यातही उकाडा होऊन फडके उतरवावे लागे. सभोवताल क्षितिजापर्यंत हिरवेगार पाणी दिसे. क्षितिजापर्यंत वर्तुळाकार कुठल्याही दिशेला किनारा दिसू नये एवढा चिल्का सरोवराचा विस्तार भव्य आहे. पावसाळ्यात एकूण १, १६५ वर्ग किलोमीटर्स एवढे विस्तृत क्षेत्र या जलाशयाने व्यापलेले आहे.
बरकूलमध्ये स्वयंचलित होडीने चिल्का सरोवरात दूरवर फेरी करून कालीजय मंदिराचे बेट आणि नालबन नावाचे बेट दाखवले जाते. कालीजय बेटावर एक विहीर होती. बेटावर आम्हाला एक सौर दिवाही पाहायला मिळाला. भारत सरकारच्या, अपारंपरिक, पुनर्नविनीक्षम, ऊर्जास्त्रोतांच्या खात्यात आमचे वैदर्भीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार साहेब आल्यापासून, अशा गोष्टींकडे आमचे हमखास लक्ष जाते. कालीजय मंदिराची एक कथा पर्यावरणीय प्रशिक्षण केंद्राने (Enviromental Education Center) तिथे एका फलकावर नोंदवून ठेवलेली आहे. ती खाली दिलेलीच आहे.
सभोवताल सर्व पाणथळ भाग दिसत होता. कुठे कुठे जमिनीत रोवलेल्या बांबूची टोके वर दिसत. त्यावर पाण्यात बुडी मारून नुकतीच माशाची शिकार साधलेले पाणकावळे पंख सुकवताना दिसत. यांव्यतिरिक्त एक मोठासा करकोचा आणि एक भला थोरला बगळाच काय तो पाहता आला. नाही म्हणायला छोटे छोटे पक्षी, टिटव्या दर्शन देत होत्याच. जानेवारीत इथे लाखो स्थानांतर करणारे पक्षी येतात असे जरी सारखे ऐकत आलेलो असलो तरी सध्या ऑक्टोबर अखेरीस मात्र अगदीच तुरळक आणि लहान सहान पक्षी आसपास दिसून येत होते.
गोपालपूर
बरकूलहून
गोपालपूरला जातांना आम्हाला वाटेत नारायणी मंदिर आणि टंपारा सरोवर पाहायचे
होते. नारायणी मंदिरात छोटिशी टेकडीच चढून जायची असल्याने आमच्या चक्रधारी
(म्हणजे शुद्ध मराठीत ड्रायव्हर) ने चपला घालूनच जाण्याचा सल्ला दिला.
मात्र मंदिराच्या बऱ्याच आधी चपला-बूट काढून ठेवावे लागले. पुढेही बरेच
चालायचे होते. आमचे 'देह देवळात आणि चित्त खेटरात' असे झाले होते. नारायणी
आणि ठाकुरजींचे दर्शन करून आम्ही एका वेगळ्याच मार्गाने खाली उतरत होतो.
तेव्हा आता आपली चपला-बुटांशी नक्की फारकत होणार असे वाटले. पण
आश्चर्यकारकरीत्या आम्ही जिथे चपला-बूट काढलेले होते तिथेच पावते झालो.
महागाईची पादत्राणेही जशी आम्ही ठेवलेली होती तशीच होती. जे आमच्या मनात
होते, ते त्या स्थानिक लोकांच्या आचरणातही नव्हते. त्यामुळे मनाला आपलीच
लाज वाटली. नारायणी मंदिरात एका झाडाला कंकण बांधून वरदान मागण्याची प्रथा
आहे. मी सांगितले गेले त्याप्रमाणे कंकण बांधून परत आलो. मात्र, आल्यावर
वरदान मागायची गोष्ट समजल्यामुळे कुठलेही वरदान मागितलेलेच नव्हते. आता
देवी "नारायणी" आणि देव "ठाकूरजी" सर्वज्ञानी असल्यामुळे त्यांनी आमच्या
व्यथा, समस्या परस्पर दूर केल्या असणारच ह्यावर आमचा विश्वास आहे. एरव्ही
आमचे 'उडिशा'दर्शन विघ्नविहीन, सुरळित संपन्न होते ना!
ज्या
कारणाने महानदीच्या मुखाशी चिल्का सरोवर निर्माण झालेले आहे त्याच कारणाने
ओरिसातील बव्हंशी सर्व प्रमुख नद्यांच्या मुखाशी पाण्याची विशाल सरोवरे
निर्माण झालेली आहेत. ऋषीकुलया नदीच्या मुखाशी झालेल्या सरोवरास टंपारा
म्हणतात. टंपारा सरोवरास आम्ही भेट दिली तेव्हा दुपारी ११-१२ चा सुमार
असावा. तिथे वाऱ्यावर चालणाऱ्या शिडाच्या होड्या कशा चालवाव्यात याचे
प्रशिक्षणवर्ग सुरू होते. किनाऱ्यावरून जीवनरक्षक बंडी (लाईफ जॅकेट) घालून
होडीच्या, उथळ शिंपल्यागत दिसणाऱ्या, फळकुटावर उतरून शिड उभारतांना आम्ही
प्रशिक्षणार्थी पाहिले. सरोवरात अनेक शिडाच्या होड्या विहरत होत्या. मात्र
शिड उभारताच प्रवाहित होणाऱ्या होड्या परतताना परततात कशा? का त्या उचलून
आणतात ह्या मनातील प्रश्नाचे उत्तर शोधायला आम्हाला पुरेसा वेळ सापडला
नाही.
गोपालपूरचा समुद्रकिनारा अतिशय प्रसिद्ध आहे. दीपगृहाजवळ दिसणारी हिरवाई म्हणजे ओबेराय हॉटेलचा हिरव्या वनश्रीने नटलेला परिसर आहे. मग युथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि त्यानंतर पंथनिवास, एकास एक लागूनच आहेत. पंथनिवासाच्या (समुद्रकिनाऱ्याकडे तोंड करून उभे राहिले असता) डाव्या बाजूकडे थोडेसे चालून गेल्यावर गोपालपूरचा सार्वजनिक किनारा दिसतो. या किनाऱ्याच्या बांधीव पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर एका बाजूला मत्स्यकन्येचे तर दुसऱ्या बाजूला गोगलगाईचे दगडी शिल्प उभारलेले आहे. ते दृश्य लागलीच लक्ष वेधून घेते. सगळ्याच परिसरातून दीपगृह सतत दिसतच राहते. संध्याकाळी आम्ही पंथनिवासाच्या खासगी किनाऱ्यावर खूप विहरलो. मग आम्ही आळीपाळीने फोटो काढत, लाटांसोबत पायाखालच्या सरकत्या वाळूचा मनसोक्त अनुभव घेतला. फिरत-फिरत आम्ही गोपालपूरच्या सार्वजनिक किनाऱ्यावर गेलो. तिथल्या मत्स्यकन्या आणि गोगलगाय यांच्या शिल्पाकृती नजरेत न भरत्या तरच नवल. दुसऱ्या दिवशी आम्ही गोपालपूरच्या किनाऱ्यावरून सूर्योदय अनुभवला. किनाऱ्यावर एका दोऱ्यास आमिष बांधून समुद्रात खोलवर जाऊन ते तिथे टाकून ठेवून लाटेच्या पाण्यासरशी ओढून बारकाले मासे पकडणारे कोळी दिसत. साऱ्या जगाच्या व्यवहारांपासून अलूफ, बेदखल राहूनही अशाप्रकारे उपजीविका मिळवणाऱ्या कोळ्यांचे मला कौतुक वाटले. ते कुणावरच अवलंबून नव्हते. दर्यादिल सागर त्यांच्या किमान गरजा सहज पुरवण्यास समर्थ होता.
तप्तपाणी
तप्तपाणीला वज्रेश्वरीसारखे गरम पाण्याचे झरे आहेत. मात्र, तप्तपाणी हे एक अभयारण्यही आहे. अभयारण्यातील अतिथी-निवासा(गेस्ट- हाऊस)सारखे, इथे पंथनिवास वसलेले आहे. पहिल्यांदा आम्हाला एका काष्ठ-कुटीत (लॉग- हाऊस) मध्ये जागा दिली होती. तिथे एक डिस्कव्हरीतल्यासारखा कोळी दिसला. पहिल्यांदा तो खोटाच वाटला. मग फुलपाखरू खातांना दिसला तेव्हा खरा असल्याची खात्री पटली. तिथल्या बगीच्यात अनेकानेक प्रकारचे गुलाब होते.
पंथनिवासात गरम पाण्याच्या कुंडातील पाणी आणून आंघोळीच्या हौदात भरण्याची सोय केलेली होती. आत सर्वत्र गंधकाचा गंध आणि वाफ परिमळत होती. जरा दूर कपडे ठेवायला दांडी होती. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ असल्याने पायऱ्यांवर पाण्याची पातळी सहज कळून येत नव्हती.
बाहेर एका ठिकाणी वेणीच्या पेडांसारखी दिसणारी पाने होती. आवाराबाहेर तीन गवताने शाकारलेल्या झोपड्या दिसत होत्या. ओरिसातील प्रवासात अनेक अतिप्रचंड वड दिसत. त्यातलाच एक त्या झोपड्यांशेजारी आढळला होता.
पंथनिवासासमोरच्या रस्त्यावरच समोरच्या बाजूला थोड्या वरच्या बाजूस तप्तपाणीचे प्रसिद्ध कुंड होते. ओरिसातील प्रथेप्रमाणे त्या मंदिरास एक सिंघद्वार (मुख्यद्वार, महाद्वार) होते. आतमध्ये एक शिवमंदिर आणि एक प्रचंड वृक्ष होता. पुढे एक दुर्गा-काली मंदिर व शेजारीच ते तप्तपाण्याचे कुंड होते. कुंडातून बाहेर पडणारे पाणी एका बाजूस एका पाईपद्वारे एका मोरीत सोडलेले होते, जिथे पाय धुण्याची, ते पाणी भरून नेण्याची सोय होती. दुसऱ्या बाजूस ते पाणी एका हौदात भरून स्नानाची सोयही केलेली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही चंद्रगिरीस तिबेटी निर्वासितांच्या छावणीस भेट देण्यास गेलो होतो. तिथे आमची कर्मा लामा यांच्याची भेट झाली.
तप्तपाणीहून चंद्रगिरीला जातांना राज्य महामार्ग क्रमांक १७ आणि ३४ यांचेवरून प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा आंबा, चिंच, सुवर्णचंपक, पांढरा चाफा, वड, पिंपळ इत्यादी विशाल वृक्षांच्या रांगा आहेत. वड तर इतके विस्तारलेले आहेत की मूळ खोड कुठले आणि पारंबी कुठली हे ओळखता येऊ नये. भवताली हिरवीगार शेते. त्यात भात व मका शेती, आणि केळी व पेरू इत्यादींचे मळे आहेत. अनेक घरांतून अंगणात मक्याची कणसे सोलून वाळत घातलेली दिसून आली. गवताने शाकारलेली घरे, शेळ्या, गाई, म्हशी यांचे कळप आणि ते हाकत जाणारे गुराखी. गुराखीही एक तालपत्रांची विणलेली टोपी घालून उन्हापावसांपासून स्वतःला वाचवतांना दिसत होते.
रांभा
रांभाच्या रस्त्यावर आम्हाला बकऱ्या, गाई, म्हशींचे कळप दिसत. त्यांचे गुराखी तालपत्राने विणलेल्या विशिष्ट प्रकारच्या टोप्या घालत.
रांभा हे चिल्का सरोवराकाठचे, पूर्व किनारी रेल्वेचे एक स्टेशन आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ वरचे एक शहर आहे. इथे पंथनिवास असून त्याचेपासून चिल्का सरोवरात स्वयंचलित नावेने फेरफटका मारता येतो. इथे हवामानखात्याची एक प्रयोगशाळा असून हवामानविषयक मापने करण्याची सोय आहे. इथेच आम्हाला भारतीय संचारनिगमचे विनिमयकेंद्र आणि मनोराही आढळला. आम्ही इथल्या पंथनिवासात एक दिवस मुक्काम केला होता आणि सकाळच्या सुमारास स्वयंचलित नावेने ब्रेकफास्ट आयलँड, घण्टशिलाचा डोंगर, बर्डस आयलँड आणि हनिमून आयलँड इत्यादी, चिल्का सरोवरातील चार बेटांवर फेरफटका करून आलो.
रांभाच्या जेटीच्या टोकाशी सिमेंट काँक्रीटचे व्यवस्थित जिने बोटींत चढ-उतार करण्यासाठी बांधलेले होते. आम्ही नावेत बसलो खरे. मात्र, लगेचच भुरूभुरू पाऊस सुरू झाला. वातावरण ढगाळलेलेच होते. गार वारे सुटले. आणि थंडी वाजू लागली. मग आम्ही ब्रेकफास्ट बेटाकडे वाटचाल करू लागलो. बेटाच्या नावाखातर एक मनोरा आणि एक छोटीशी खोलीवजा बांधकामच काय ते दिसत होते. दूरवरून पांढऱ्या ठिपक्यासारखे दिसणारे बांधकाम जवळ आल्यावर असे दिसू लागले. उन्हाळ्यात पाणी उतरल्यावर त्याच्याभोवतीचे बेट वर येऊन दिसू लागते असे नावाडी सांगत होता. मनोऱ्याजवळच्या चौथऱ्यावरील दगडाला होडी बांधून आम्ही वर चढलो. एव्हाना पाऊस थांबला होता. खोलीच्या मनोऱ्याकडील बाजूला दार, म्हणजे त्या आकाराचा उघडा भाग होता. तर इतर तीन बाजूंना उभट आयाताकृती झरोके होते. एकातून बर्डस आयलँड दिसे तर तर दुसऱ्यातून हनिमून आयलँड. तिथून उतरून आम्ही मनोऱ्याकडच्या बाजूच्या डोंगरातील घण्टशिलाच्या गुहेकडे निघालो. गुहेत एक हार घातलेला फोटो होता. वर चढून गेल्यावर वरल्या अंगाने बाहेरही पडता येत असे. आम्ही मात्र पुन्हा माघारी परतलो. होता होता आम्ही बर्डस आयलँडजवळ पोहोचलो. ते पाहिले. स्थलांतरित पक्षी मात्र मुळीच दिसले नाहीत. ते डिसेंबरनंतर येतात असे समजले.
आता आम्ही बर्डस आयलँड मागे टाकून हनिमून आयलँडकडे निघालो होतो. मग हनिमून आयलँड दिसू लागले. जेटी बांबूंचीच बनवलेली आहे. तिथे एक ताल वृक्ष दिसला. ओरिसात तालपत्रांच्या टोप्या, तालपत्रांची घरे, शिवाय तालपत्रांवर कोरलेली रंगचित्रे इत्यादी पाहिलेली असल्याने तालवृक्ष जवळून पाहण्याचे कौतुक पुरे करून घेतले. काही तालपत्रेही तोडून सोबत घेतली. आपल्याला कोरीव काम करता येते का ते बघायला!
हनिमून आयलँड हे चिल्का सरोवरातील एका मोठ्याशा बेटाचे नाव आहे. ओरिसा पर्यटन विकास महामंडळाने इथे सिमेंटचे चौथरे बांधून, त्यांचेवर कायमस्वरूपी लोखंडी पाईपचे सांगाडे उभारून ठेवलेले आहेत. म्हणजे वर कापड पसरले की तंबू तयार. आतमध्ये पाश्चात्य पद्धतीचे कमोडही बसवलेले आहेत. मधुचंद्र साजरा करू पाहणाऱ्या नवपरिणत युगुलांना, मंडळ इथे भाड्याने तंबू बांधून राहू देत असावे. बेटावर एक विहीर आहे. एक बाई पाणी काढतांनाही दिसली. काही स्थानिक रहिवासी व त्यांची गवताने शाकारलेली घरे आहेत. नुकत्याच आलेल्या मच्छीमार होडीतून एक मुलगा धावत आला. त्याने त्या रहिवाशाच्या हातात मोठेसे दिसणारे काही मासे ठेवले. बेटाचा बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जात असावा. उन्हाळ्यात बेट खूपच विस्तारलेले दिसत असावे.
हजाराहून जास्त वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या आणि शेकडो बेटांना स्वतःच्या विस्तारात सामावून घेणाऱ्या चिल्का सरोवराने लाखो स्थलांतरित पक्षांना सालोसाल शीतकालीन आसरा द्यावा आणि साऱ्या परिसराचाच समतोल राखावा या निसर्गचमत्काराचे आता आम्हीही साक्षीदार झालेलो होतो. अनेक किलोमीटर दूरपर्यंत नावाडी आणि आम्ही प्रवासी यांव्यतिरिक्त सारेच निर्मनुष्य असावे, चहूबाजूंस हिरव्यागार पाण्याव्यतिरिक्त कुठेही किनारा नजरेस येऊ नये, अशा नौकाविहाराचे अविस्मरणीय सौख्यही आता आम्ही गाठीस जोडलेले होते.
कोणार्क
सूर्यमंदिराची प्रकाशचित्रे आजवर काही कमी प्रकाशित झालेली नाहीत. महाजालावरही अनेक चित्रे सापडू शकतात. आम्हीही भरपूर चित्रे काढली. मात्र तिथल्या नागकन्यांची कमनीयता आणि मानवी मूर्त्यांची प्रमाणबद्धता अवर्णनीय आहे. त्यात वर्णिलेल्या विषयांइतके विषय महाराष्ट्रातल्या लेण्यांतही वर्णिलेले नाहीत. शिल्पकाराला असलेली मूळ वर्ण्य विषयाची जाण, एवढी भव्य शिल्पाकृती करण्यासाठी लागणारा राजाश्रय, त्या त्या राजांची ते ते विषय शिल्पाकृतींसाठी निवडण्यातली दृष्टी, हे सारे आपल्या पूर्वजांच्या मानवी जीवनाविषयीच्या तपशीलवार ज्ञानाविना शक्य होणारे नव्हते. धन्य ते शिल्पकार, धन्य ते प्रजापती आणि धन्य आपले पूर्वज. हे सारे पूर्वापार चालत आलेले ऐश्वर्य पाहण्यासाठी आम्ही इथे आलो हे आमचे सुदैव. वाचकांनीही आयुष्यात एकदा तरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे असेच हे सारे वैभव आहे.
सूर्यमंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच आम्हाला छत्र्या भाड्याने घ्याव्या लागल्या. कारण पाऊस सुरू झालेला होता. मग आम्हाला भारतीय पुरातत्त्व खात्याने संमत केलेल्या जेष्ठ मार्गदर्शकाने गाठले. त्याला फोटोग्राफीचा गजबचा शौक असल्याने कोणार्कला आमचे फोटो कोण काढेल ही आमची चिंता समूळ नष्ट झाली. तो कधी आमचा क्लोज-अप काढे. कधी विशिष्ट जागेचाच हट्ट धरे. कधी पायरीवर चढवून उंचीत साम्य आणू पाहे. तर कधी चाकासोबत फोटो काढण्यास विशिष्ट रचना करवून घेत असे. कधी बगीच्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढे. तर कधी विशिष्ट जागी उभे करून फोटो काढे. कधी चाकाच्या या बाजूने फोटो काढे. तर कधी त्या बाजूने फोटो काढे. असे कित्येक फोटो त्याने काढले. त्यात आम्हीही होतो. तसेच इतर प्रेक्षकही होते. मात्र, गोल फिरून आल्यावर, मुख्य द्वारापाशी वर चढण्याची वेळ येताच, कुठलाच मार्गदर्शक वर चढत नाही, असे सांगून त्याने आमचा निरोप घेतला.
मग आम्ही हिरव्यागार बगीच्याचा फोटो काढला. इसवीसनाच्या बाराव्या शतकातही आपल्याला जिराफ माहीत असल्याचा पुरावा कॅमेऱ्यात बंद केला. वेगवेगळ्या वादक आणि नर्तकांच्या शिल्पांचे प्रकाशचित्रण केले. चाकाच्या आसातील चक्रांमधली मदभरालसा चित्रित केली. बाहेरच्या दगडी भेट-वस्तूंच्या दुकानाचा एक फोटो काढला.
तालपत्रांवरची चित्रकारी
तालपत्रावर अणकुचीदार हत्याराने कोरून चित्ररेखा तयार करायच्या. त्या कोरलेल्यावर मग दालच्या (दाल: कमळाच्या जाळ्यांप्रमाणे पाण्याच्या डबक्यांत अनिर्बंध वाढणारी अळूसारख्या हिरव्यागार पानांची आणि हळदीच्या फुलाच्या आकाराची, फिकट जांभळी फुले असणारी वनस्पती) पानांचा रस चोपडून काळसर हिरव्या चित्ररेखांची चित्रे बनवणे, म्हणजे तालपत्रांवरची चित्रकारी.
या चित्रात आठ इंची लांब आणि जवळपास एक इंची (नैसर्गिकरीत्या ठरणाऱ्या) रुंद पत्रांवर सुरेख मंगल-कलश चितारला आहे. आपल्या कालनिर्णयच्या आकाराचे चित्र ह्यातून निर्माण होते. ते साधारणपणे तीनशे रुपयांना विकतात. देवादिकांची किंवा जनजीवनाची चित्रे या शैलीत रेखाटली जातात. कोणार्क शैलीतील कामचित्रेही या शैलीत रेखाटण्याची प्रथा आहे. या प्रकारे पुस्तक-खुणा, भेटपट्या इत्यादीही बनवल्या जातात, ज्या दहा दहा रुपयांना विकल्या जातात.
देवादिकांची, प्राण्यांची आणि कामजीवनाची कोणार्क शैलीतील चित्रे दशावतारांच्या स्वरूपातही उपलब्ध असतात. अशा चित्रांत वर एक देवाचे चित्र. खाली त्याचे दहा अवतारांची दहा चित्रे अशी रचना असते. या दशावतारांना, "आवाज" दिवाळी अंकात असतात तशा द्वयर्थी खिडक्यांसारख्या त्रयर्थी खिडक्या काढून दहाही अवतार, दहा निरनिराळे प्राणी अथवा दहा कामचित्रे, खिडक्या उघडून पाहता येतात. घड्या घालून हे सर्व चित्र एका आठ इंच लांब व सुमारे दोन इंच रुंद पट्टीच्या आकारात गुंडाळून ठेवता येते. चित्राच्या पाठीमागे पोथीला वापरतात तसे कापड लावलेले असल्याने त्याचाच गुंडाळण्यासाठी उपयोग होतो. दोन तालपत्रे एकमेकास बिजागरींनी जोडावीत तद्वत काळ्या दोऱ्यांनी शिवलेली असतात. ती शिवण वर्षानुवर्षे टिकते असा दावाही केला जातो.
आणखीही एका लोक कलेचा उल्लेख इथे करावाच आगेल. तो म्हणजे पट्टाचित्रणाचा. कपड्यावर वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून, रासक्रीडा, कृष्णचरित्र, दशावतार, कंदर्परथ इत्यादी रेखाटणारी उडिशा शैलीतील चित्रे लक्षवेधक असतात. बारीक बारीक वक्ररेषांच्या मोहक आकृतीबंधांनी ती आणखीनच सुशोभित केलेली असतात. याशिवाय उडिशात बहारीची नृत्यकला विद्यमान आहे. मात्र तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग आम्हाला आला नाही.
जगन्नाथपुरी
पुरी हे आपल्या चार धामांपैकी एक ठिकाण. जगन्नाथपुरी. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरील एक सुंदर शहर. पुरी शहरात, पुरीला ‘नीलाचल’ही म्हणतात. जगन्नाथाचे मंदिर गंगवंशाच्या कोडगंग राजाने ११३५ ते ११५० दरम्यान बांधून काढले. मंदिराच्या गाभाऱ्यात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या आहेत. आषाढ शुद्ध द्वितीयेपासून आषाढ शुद्ध दशमीपर्यंत (जून-जुलैमध्ये) इथे रथयात्रा असते. मूर्त्यांना रथारूढ करून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील गुंडेचा मंदिरात रथ नेऊन स्थानापन्न करतात. सात दिवस त्यांचा मुक्काम गुंडेचा मंदिरातच असतो. मग पुन्हा रथयात्रा गुंडेचा मंदिराकडून मूळ मंदिराकडे येते आणि मूळ मंदिरात मूर्त्या प्रतिष्ठित करून रथयात्रा संपन्न होते. ही रथयात्रा फार पूर्वीपासून सुरू आहे. चौदाव्या शतकातील इटालियन प्रवाशाच्या दैनंदिनीत याचे उल्लेख सापडतात.
जगन्नाथाचे मंदिर हे उडिशातील सर्वात भव्य मंदिर आहे. मंदिरात फोटोग्राफी निषिद्ध आहे. मंदिराला चारी बाजूंनी मजबूत तटबंदी असून पूर्वेला सिंघद्वार, पश्चिमेला व्याघ्रद्वार, दक्षिणेला अश्वद्वार, आणि उत्तरेला गजद्वार आहे. सर्व द्वारांवर गोपुरे आहेत. सिंघद्वाराशी पोहोचण्यास बावीस पायऱ्या चढाव्या लागतात.
पुरीचे मंदिर दूरून नीट दिसत नाही कारण त्याच्याभोवती तटबंदी आहे आणि खरेतर सारे गावच त्याच्याभोवती वसलेले आहे. कोणार्कला सूर्यमंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असल्याने तेथे स्वतंत्र व्यवस्था शक्य आहे आणि मंदिरापासून गाव बराच दूर आहे. पुरीचे मंदिर जवळूनही नीट पाहता येत नाही. याचे कारण मात्र मनोरंजक आहे. मंदिर परिसरात भक्तांचा अविरत राबता असतो. पंडे, पोलिस, श्वेतवस्त्रधारी स्त्रिया यांची सारखीच लगबग चाललेली असते. परिसरातच खिचडी शिजविण्याकरता अगणित चुली सारख्या पेटलेल्या असतात. पूजा सामान, प्रसादाची दुकाने इत्यादीची रेलचेल सतत फिरती असते. मंदिराच्या शिखरावर बाहेरच्या बाजूने सुंदर शिल्पकला सजवलेली आहे. मात्र मंदिराचे शिखर अतिउंच आहे आणि समकक्ष उंचीवर जाऊन कलेचा जवळून आस्वाद घेण्याची कुठलीही सोय नाही. जमिनीवरून मान उंचावून पाहायला अडथळेच फार. शिवाय कॅमेरा निषिद्ध असल्याने क्लोज-अप घेऊन पाहण्याचीही सोय नाही. त्यात आम्ही गेलो तेव्हा बारीकसा पाऊसही पडत होता. त्यामुळे मंदिर परिसर आणि बडा डंडा यांचे मनसोक्त दर्शन झाले नाही. पुरीच्या पंथनिवासात खाल्लेले दही आणि प्यायलेले सूप मात्र लक्षात राहिलेले आहे. उत्तम चवीमुळे.
नंदनकानन
भुबनेश्वरपासून २० किलोमीटर उत्तरेला भुबनेश्वर व कटक या जोड शहरांच्या मध्यभागी, महानदीच्या किनाऱ्यावर नंदन कानन हे विशाल प्राणीसंग्रहालय वसलेले आहे. प्राणीसंग्रहालयातील सर्व प्रदर्शनीय भाग सर्व सुविधांसहित पाहण्यास ४ ते ६ तास लागतात. आम्हाला दोन तासच काय ते उपलब्ध होते. म्हणून आम्ही खेळण्यातील आगगाडी, नौकाविहार, रज्जूमार्गाने उंचावर जाऊन भुबनेश्वर दर्शन इत्यादींवर पाणी सोडले. व्हाईट टायगर सफारी आणि लायन सफारीचा अनुभव मात्र घेता आला. नैसर्गिक रहिवासातील सिंहाचे जोडपे पाहता आले.
प्राणीसंग्रहालयात, सिंह, वाघ, पांढरा वाघ, तरस, मगर, सुसर, पाणघोडा, गेंडा, अजगर, हरणे, नीलगायी इत्यादिकांचे व्यवस्थित दर्शन झाले. इथे अधिकृत मार्गदर्शक सोबत नेता येतो. अर्थातच मोल देऊन. प्राणीसंग्रहालय विस्तृत आणि प्रेक्षणीय आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.