‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागापासून माहिती घेऊ या मुंबईतील पर्यटनस्थळांची. सुरुवातीला पाहू या मुंबईचा थोडा इतिहास...
ठिकठिकाणी खाजणे असलेला या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र मागे हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पाटप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. जेराल्ड आंजिअर हा येथे येण्यापूर्वी सुरतला होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्यावेळी तो तेथे होता. त्या हल्ल्यात इंग्रजांचे नुकसान झाले नसले, तरी शिवाजी महाराजांची दहशत मात्र निर्माण झाली. १६७२मध्ये त्याने सुरतेहून मुंबईला मुख्य ठाणे हलविले. इंग्रजी कायदा व न्यायालये, टाकसाळ, रुग्णालय, छापखाना, नगररचना, स्थानिक समाजांच्या पंचायती अशा प्रशासकीय सुधारणा त्याने केल्या. गुजराती बनिया व आर्मेनियन या व्यापारी समाजांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईची रचना करण्याची सुरुवात त्याने केली.
खरे तर जेराल्ड आंजिअर याला मुंबईचा आद्य नगररचनाकार असे म्हणावे लागेल. १६६२च्या सुमारास इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहानिमित्त पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली. प्रत्यक्षात जानेवारी १६६५मध्ये इंग्रजांना तिचा ताबा मिळाला. चार्ल्सने १६६८मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला मुंबई भाड्याने दिली. मुंबईत आरंभी माझगाव, परळ, वरळी या भागात वस्ती होती. परळ व शिव येथे कुणबी राहत. वरळी येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू व साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७०मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनिया येऊ लागले. त्याचबरोबर बोहरी, मुसलमान व्यापारीही येऊ लागले.
गेटवे ऑफ इंडिया : पर्यटकांचे आणि मुंबईमधील लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेले हे देखणे स्मारक १९११मध्ये अपोलो बंदर येथे किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या आगमन प्रसंगाची आठवण म्हणून बांधण्यात आले. याचे बांधकाम बेसाल्ट दगडांच्या साह्याने करण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या कामाची सुरुवात १९१४मध्ये झाली. दिल्ली येथे १९११मध्ये झालेल्या कार्यक्रमात याची फक्त प्रतिकृती किंग जॉर्ज (पाचवे) यांना दाखविण्यात आली होती. ३१ मार्च १९११ रोजी फक्त पायाभरणीचा कार्यक्रम करून कोनशिला बसविण्यात आली. आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी बनविलेला आराखडा १९१४ साली मंजूर झाला. प्रत्यक्षात गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १९२४मध्ये पूर्ण करण्यात आले. हे काम गॅमन इंडिया या ब्रिटिश कंपनीमार्फत करण्यात आले. याच गेटमधून ब्रिटिशांची शेवटची पलटण २८ फेब्रुवारी १९४८ रोजी समारंभपूर्वक बाहेर पडली. त्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.
स्मारकाभोवती पाच जेट्टी (धक्के) आहेत. पहिली जेट्टी खास भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी आहे, तर दुसरी आणि तिसरी व्यावसायिक ‘फेरी ऑपरेशन’साठी वापरली जाते. चौथी बंद आहे आणि पाचवी रॉयल बॉम्बे याट क्लबसाठी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जेट्टीवरून पर्यटकांना एलिफंटा लेण्यांकडे नेले जाते. अलिबागजवळील रेवस व मांडवा बंदराकडे जाणाऱ्या फेरीबोटीही येथून सुटतात.
ताजमहाल हॉटेल : गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच उत्तर-पश्चिम बाजूला टाटा यांच्या ताज ग्रुपच्या पंचतारांकित ताजमहाल हॉटेलची भव्य इमारत आहे. ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूला हॉटेलचीच टोलेजंग इमारत आहे. दोन वेगवेगळ्या इमारती दिसत असल्या, तरी या दोन्ही इमारती टाटा यांच्या ग्रुपच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. असे म्हणतात, १८६५मध्ये मुंबईतील प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेटजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली; पण काही जणांना हे मान्य नाही. काहींच्या मते ‘टाइम्स’च्या संपादकांच्या सूचनेवरून मुंबईत चांगले साजेसे हॉटेल व्हावे या हेतूने ते बांधले गेले. सुमारे ६०० रूम्स व ४४ सूट या हॉटेलमध्ये आहेत.
राजभवन : पहिले राजभवन १७७० ते १७९० दरम्यान फोर्ट भागात (किल्ला) होते. त्यानंतर ते परळ भागात हलविण्यात आले. तेथून ते १८८०मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांनी मलबार हिल भागात हलविले. ‘प्राइसेस मेमारियल’मधील नोंदीनुसार गव्हर्नर मेडोस १७८८ ते १७९० या काळात अधूनमधून येथे राहायला यायचे. सर ईवान नेपियन १८१२ ते १८१९ या काळात या ठिकाणी एका लहान खोलीत राहत होते. समुद्राची किनार आणि वृक्षराजी असलेल्या ५० एकर जागेवर रीतसर गव्हर्नर निवास बांधण्यात आला. राजभवन परिसरात जलभूषण, जलचिंतन, जललक्षण, जलविहार आणि जलसभागृह या इमारती आहेत.
जलभूषण : गव्हर्नर माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन जेथे राहिले होते, त्याच टुमदार बंगलीच्या पायावर जलभूषण उभे आहे. ब्रिटिश लेखक हेबर यांनी याचे वर्णन ‘समुद्राच्या पाण्याने धुतली जाणारी खडकाळ व वृक्षाच्छादित भूभागावरील टुमदार बंगली’ असे केले आहे. लॉर्ड एलफिन्स्टन यांनी बांधलेला रस्ता राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या ‘जलभूषण’ कडे जातो. माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आयात केलेले फ्रेंच फर्निचर राज्यपालांच्या भव्य कार्यालयात ठेवले आहे. दुर्मीळ कलाकुसर असलेले अतिशय सुंदर लाकूडकाम, सुबक चित्रकाम असलेल्या तसबिरी आणि लाकडावर केलेले ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण यांनी जलभूषण संपन्न आहे. कुंचल्याच्या कुशल फटकाऱ्यांनी कलाकारांनी लेसचा नाजूकपणा आणि मोत्यांचे तेज जिवंत केले आहे. वैभवशाली निवासस्थानात व कार्यालयात भारतीय कलेच्या कलाकारांनीदेखील आपले मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय श्रेष्ठ कलाकारांनी रेखाटलेली चित्रेही ‘जलभूषण’मध्ये आहेत.
जललक्षण : हे निवासस्थान भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. येथे मराठा सरदारांच्या तसबिरींचा संग्रह आहे. असे म्हणतात, की सर बॅटल फ्रेरे यांनी १८५७च्या बंडानंतर ही चित्रांची मालिका चित्रित करण्यासाठी थिओडोर जेन्सेन यांची नेमणूक केली होती. आपल्या कुंचल्याने व तैलरंगांच्या साह्याने जेन्सेनने सरदारांचा बाणेदारपणा व डौल प्रत्यक्षात उतरवला आहे.
२०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळजवळ १५ हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून, ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय तयार केले गेले असून, त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षांमध्ये राजभवनच्या इतिहासाची झलकदेखील दाखविली जाणार आहे.
वाळकेश्वर मंदिर : वाळकेश्वर व बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात आहे. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव इ. स. ११२७मध्ये शिलाहार राजवटीत बांधला. त्यानंतर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी हे मंदिर नष्ट केले. परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा उभे राहिले. वालुकेश्वर म्हणजेच वाळूचा देव व त्यावरून वाळकेश्वर हे नाव रूढ झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, श्री रामचंद्राने सीतेचा शोध घेत असताना शिवाची पूजा करण्यासाठी येथे वाळूचे शिवलिंग बनविले व पूजेसाठी पाणी नसल्याने बाण मारला असता गंगा अवतरली व कालांतराने येथे तलाव बांधला गेला आणि त्याचे नाव बाणगंगा पडले. बाणगंगा तलाव आयताकृती असून, त्याला चारही बाजूंनी पायऱ्या बांधल्या आहेत. तलाव खूपच सुंदर दिसतो एका बाजूला तळाकडे येण्यासाठी असलेल्या वाटेवर बाजूला दोन सुंदर मनोरे बांधले आहेत. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. बाणगंगेच्या जवळ आणखी एक जुने महादेवाचे मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणून ते ओळखले जाते. हा परिसर अतिशय शांत व मनाला आनंद देणारा आहे.
जिना हाउस : मुंबईतील मलबार हिलवरील साउथ कोर्ट भागात समुद्राकडे तोंड करून असलेला, पाकिस्तानचे बॅ. मोहम्मद अली जिना राहत असलेला बंगला आहे. आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी युरोपियन शैलीने यांचे संकल्पचित्र बनवले होते. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याजवळच हा बंगला आहे. पाकिस्तान सरकार त्यावर अधिकार सांगत आहे.
शांतिवन : नावाप्रमाणेच हे या भागातील शांती देणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. नैसर्गिक उतारावर असलेल्या या उद्यानात विविध लतावृक्ष आहेत. बांधीव पायऱ्यांनी याची शोभा अधिकच वाढते. आजूबाजूला फिरणारे मोर लक्ष वेधून घेत असतात. हँगिंग गार्डनच्या मागे हे उद्यान आहे. मलबार हिल भागात प्रियदर्शनी पार्क, चक्रवर्ती उद्यान, आदित्य बिर्ला पार्क अशा अनेक खासगी जागांमध्ये समुद्रकिनारी बागा व निवासी संकुले आहेत. रिज रॉड आणि लीला जगन्नाथ मार्ग यांच्यामध्ये इको पार्क आहे, तसेच अनेक उद्याने आहेत.
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
चर्चगेट स्टेशन : हे मुंबई उपनगरी/ रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील (वेस्टर्न लाइन) दक्षिणेकडील टर्मिनस आहे. चर्चगेट स्टेशनपासून सेंट्रल रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, मरीन ड्राइव्ह, हायकोर्ट, मंत्रालय, क्रॉफर्ड मार्केट ही ठिकाणे जवळ आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या मुंबईतील मूळ किल्ल्याला असलेल्या तीन दारांपैकी (गेट) एक प्रवेशद्वार येथे होते. येथून निघणारा रस्ता प्रसिद्ध सेंट थॉमस चर्चकडे जात असे. म्हणून या गेटला चर्चगेट असे नाव पडले. १८६०मध्ये हे गेट पाडण्यात आले. १८७०मध्ये येथे रेल्वे स्टेशन बांधण्यात आले व त्याचे नाव चर्चगेट असे ठेवण्यात आले. १८७२मध्ये रेल्वे कुलाब्यापर्यंत वाढविण्यात आली. तथापि कुलाबा स्टेशन १९३०मध्ये बंद करण्यात आले व चर्चगेट हे दक्षिणेकडील सुरुवातीचे स्टेशन झाले. १८५५मध्ये मुंबई-बडोदा रेल्वेचे काम सुरू झाले. १८६७पर्यंत मुंबईपर्यंतचे काम पूर्ण झाले. ग्रँट रोडच्या पुढे मरीन लाइन्सजवळ ‘बॉम्बे बॅकबे’ नावाचे स्टेशन बांधण्यात आले. १२ एप्रिल १८६७ रोजी ‘बॉम्बे बॅकबे’पासून पहीली उपनगरीय रेल्वेसेवा सुरू झाली.
सध्या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणूपर्यंत आहे. विरारसाठी पहाटे सव्वाचार वाजता पहिली लोकल चर्चगेटहून सुटते. शेवटची लोकल मध्यरात्री एक वाजता बोरीवलीकडे जाते. दर १० मिनिटांनी येथून एक गाडी सुटते आणि येते. मध्य आणि पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर एकमेकांच्या जवळून धावतात. ठाण्याकडून चर्चगेटकडे जाणारे प्रवासी दादरला गाडी बदलतात. विरार-वसईकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे प्रवासीही दादरला उतरूनच गाडी बदलतात. २०१०पर्यंत १२ डब्यांच्या लोकल होत्या. त्या आता १५ डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स आणि बेस्टच्या बसेस रक्तवाहिनीप्रमाणे मुंबईकरांची अव्याहतपणे सेवा करीत आहेत.
मरीन ड्राइव्ह : मरीन ड्राइव्ह बघितल्याखेरीज मुंबईचे दर्शन झाल्यासारखे वाटत नाही. नरीमन पॉइंटपासून बाबुलनाथ आणि मलबार हिलला जोडणारा हा ३.६ किलोमीटरचा ‘सी’ आकाराचा आठपदरी रस्ता समुद्राच्या काठावरच आहे. या रस्त्याचे अधिकृत नाव नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे आहे. पूर्वेला रेल्वे, निरनिराळी जिमखाना मैदाने व आर्ट डेको शैलीतील इमारती आणि पश्चिमेला निळाशार समुद्र यामुळे याचे सौंदर्य खुलून दिसते.
हा रस्ता वाळकेश्वर रस्त्यापासून दलदलीत भर टाकून भागोजीशेठ कीर आणि पालनजी मिस्त्री यांनी सिमेंट-काँक्रीटमध्ये बांधला. १९२० ते १९३०च्या दरम्यान श्रीमंत पारशी व्यापारी व उद्योजकांनी आर्ट डेको शैलीतील इमारती येथे बांधल्या. या आर्ट डेको इमारतींपैकी कपूर महल, झेव्हर महल आणि केवल महाल अशा अनेक सुंदर इमारती आहेत. ही बांधकामे १९३७ ते १९३९च्या दरम्यान झाली. (मरीन ड्राइव्ह परिसरातील आर्ट डेको शैलीतील इमारतींबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
तारापोरवाला मत्स्यालय : सर्व बाजूंनी सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे, अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक मिलार्ड यांनी मांडली. ही कल्पना तारापोरवाला या दानशूर कुटुंबाने दिलेले पैसे व जमिनीमुळे नऊ मे १९४७ रोजी २८ वर्षांनी मूर्त स्वरूपात आली. आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत मरीन लाइन्सवर असून, तिची लांबी १०८ फूट व रुंदी ९४ फूट आहे. २७ मे १९५१ रोजी तारापोरवाला मत्स्यालय आणि तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र यांचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे हस्ते झाले. येथ सागरी आणि गोड्या पाण्यातील विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. सागरी प्रकारातील हेलिकॉप्टर, अरोवना, ग्रूपर, निळा रंग असलेला स्टिंग्रे, तारा, जोकर, हार्क, ट्रिगर, ग्रूपर, पर्पल फायरफिश, कॉपरबँड बटरफ्लाय फिश, क्लाउन ट्रिगरफिश, ब्लू रिबन असे अनेक जातींचे मासे येथे आहेत. गोड्या पाण्यातील माशांमध्ये रेड डेव्हिल, जग्वार, इलेक्ट्रिक ब्लू जॅक डेम्प्सी, फ्रंटोसा, कॅटफिश यांसारख्या माशांचा समावेश आहे. १००हून अधिक प्रकारांचे मासे, जलजीव, नैसर्गिक खडक आदी प्रकार येथे पाहायला मिळतात.
मत्स्यालयाची देखभाल मत्स्यव्यवसाय विभाग करतो. मत्स्यालयात समुद्री पाण्याच्या १६ आणि गोड्या पाण्याच्या नऊ टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. ३२ उष्णकटिबंधीय टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मत्स्यालयाच्या उष्णकटिबंधीय विभागात गर्भवती माशांसाठी मॉस अॅक्वेरियम, तसेच जलीय वनस्पतींची व्यवस्था केली आहे. बाहेरून आणलेले मासे टँकमध्ये टाकण्यापूर्वी त्यांना वातावरणात समरस होण्यासाठी, तसेच त्यांचे रोगनिदान, उपचार करण्यासाठी गोड्या व खाऱ्या पाण्याची स्वतंत्र युनिट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक टँकमध्ये एलईडी व मेटलहॅलाइड ट्यूब लावून प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
वानखेडे स्टेडियम : १९७४मध्ये हे स्टेडियम महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या प्रयत्नांतून उभे राहिले. त्याची आठवण म्हणून त्यांचेच नाव या स्टेडियमला देण्यात आले. ३३ हजार ८०० प्रेक्षक बसू शकतील, असे हे स्टेडियम आधुनिक सोयींनी युक्त असे आहे. कॅन्टिलिव्हर छप्पर हे स्टेडियमचे मुख्य आकर्षण आहे. टेफ्लॉन फॅब्रिक छप्पर कमी वजनाचे आणि उष्णता प्रतिरोधक आहे. प्रेक्षकांना अधिक चांगले दिसावे यासाठी छतासाठी बीम वापरलेले नाहीत. छतावर एक्झॉस्ट फॅन बसविले आहेत जे स्टँडवरून गरम हवा बाहेर टाकतात. स्टेडियममध्ये उत्तर व दक्षिण स्टँडसाठी २० लिफ्ट आहेत. वानखेडे स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी संयुक्तपणे प्रकल्प तयार करण्याकरिता मे. शशी प्रभू व असोसिएट्स आणि पी. के. दास असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती. १९७४-७५नंतरच्या मोसमामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा पहिला सामना येथे खेळला गेला. पतौडीच्या नेतृत्वाखाली हा सामना भारत हरला होता. त्या वेळी क्लाइव्ह लॉइडने नाबाद २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना येथे जिंकला. सचिन तेंडुलकर त्याचा शेवटचा सामना येथे खेळला. या मैदानाच्या अशा अनेक आठवणी आहेत.
जिमखाने : मरीन ड्राइव्हवर एकूण सात जिमखाने आहेत. ब्रिटिश सरकारने मुंबईतील सर्वधर्मीयांसाठी जिमखाने उपलब्ध करून दिले होते.
पारसी जिमखाना : हा एक जिमखाना पारशी लोकांच्या क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी तयार केला होता. मुंबईमध्ये जातीय धर्तीवर बांधलेला हा पहिला जिमखाना होता. २०१०मध्ये पारसी जिमखान्याने अन्य समुदाय संघटनांसह क्रिकेटमधील समुदायात रस निर्माण करण्यासाठी एक प्रकल्प जाहीर केला.
येथे नतमस्तक झालेच पाहिजे
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांचे स्मारकही मरीन ड्राइव्ह भागात आहे. फोर्ट भागातून हल्ला करून पळून जाणाऱ्या अजमल कसाबला पकडण्याचा थरार गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या सुभाषचंद्र रोडवरच झाला. ओंबळे यांनी त्याच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कसाबला जिवंत पकडता आले.
कसे जाल मरीन ड्राइव्हकडे?
माहीम किल्ला : माहीम नावाचे दोन किल्ले आहेत. एक पालघरजवळील केळवे येथे व मुंबईमधील माहीममध्ये. हा किल्ला माहीमच्या खाडीजवळ झोपडपट्टीत आहे. अतिक्रमणांनी वेढला आहे. त्यामुळे तो दुर्लक्षित राहिला आहे. या किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले व कधी केले याची माहिती उपलब्ध नाही. हा किल्ला इ. स. १५१६मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये सतत खूप चकमकी होत होत्या. अखेर पोर्तुगीजांनी यावर इ. स. १५३४मध्ये बस्तान बसविले. हाच किल्ला पुढे इ. स. १६६१मध्ये पोर्तुगीजांनी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला. माहीम खाडीचे संरक्षण आणि मुंबईची उत्तरेकडील चौकी असा दुहेरी उपयोग या किल्ल्याचा इंग्रजांना झाला. या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे; मात्र आत कोणतीही वास्तू उभी नाही.
धारावी : जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्येचे ठिकाण म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीचे क्षेत्रफळ २.१ चौरस किलोमीटर आहे. धारावीमध्ये असंख्य घरगुती उद्योग चालू असतात. सॅक, चामडे, कापड, प्लास्टिक, होजिअरी, कुंभारकाम आणि कापडावरचे ब्लॉक प्रिंटिंग व्यवसाय असे अनेक उद्योग येथे चालतात. येथील एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे एक अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे. धारावीतील झोपड्यांची किंमतसुद्धा २५ लाखांच्यावर आहे. अनेक झोपड्या या टीव्ही, एसीसह असतात.
रिवा किल्ला : इ. स. १७३७ च्या आसपास हा किल्ला बांधण्यात आला. रिवा किल्ला सायन रेल्वे स्टेशनला बिलगून असलेल्या टेकडीवर आहे. किल्ल्याची ओळख सांगण्यासाठी फक्त एक गोल बुरुज शिल्लक आहे. रिवा किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष दिसून येतात.
शीव किल्ला : या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे चौकोनी आकाराची एक मोठी विहीर (हौद) आहे. हा किल्ला दक्षिण-उत्तर असून, तटबंदी, बुरूज, इमारतीचे अवशेष आणि प्रवेशद्वारे यांवरून किल्ल्याच्या वैभवाची प्रचिती येते. किल्ल्याची दारे तोफ झाल्यावर बंद होत असत. सरकारचे पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालय येथे आहे. त्याच्या मागे दोन तोफाही आहेत. येथे एक छोटा धबधबा, तसेच किल्ल्याभोवती उद्यान केल्यामुळे पर्यटकांची पावले वाळू लागली आहेत.
मनीष मार्केट : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मनीष मार्केटमध्ये कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. या बाजारात जुन्या सेकंडहँड मोबाइलपासून ते नवीन आयफोनपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. पूर्वी तस्करीच्या वस्तू येथे मिळत असत. त्याची जागा आता चायना मेड वस्तूंनी घेतली आहे. पूर्वीच्या टेपरेकॉर्डर, ट्रान्झिस्टर या गोष्टींची जागा आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली आहे. आता पेनड्राइव्ह, कम्प्युटर्सही विक्रीला ठेवलेले दिसतात; मात्र खरेदी करताना सावधानता बाळगावी. वस्तूंची मांडणी इतक्या सुंदर तऱ्हेने केलेली असते, की बघणारा एकदम मोहित होतो.
जव्हेरी बाजार : भुलेश्वर भागात मंगलदास मार्केटजवळ श्यामलदास गांधी रोडच्या उत्तरेला हा बाजार आहे. हा सुवर्णबाजार भारतात प्रसिद्ध आहे. साधारण १८६४च्या सुमारास हे सोने व्यापाराचे ठिकाण झाले. या वेळी अनेक पेढ्या येथे आल्या. सर्व प्रकारची रत्ने व मौल्यवान दगड या बाजारात उपलब्ध आहेत. रत्न आणि मौल्यवान धातूपासून बनवलेल्या आधुनिक डिझाइनचे, पारंपरिक भारतीय डिझाइनचे दागिने खरेदीसाठी जव्हेरी बाजार सुरक्षित असल्याचे मानले जाते. महागड्या धातूंनी बनवलेल्या फोटो फ्रेम, क्लिप्स, चहाचे सेट्स, डिनरवेअर, खेळणी आणि इतर लक्झरी जीवनशैलीच्या वस्तूंसाठीदेखील प्रसिद्ध आहे. येथून हिरे-रत्ने यांची निर्यातही होते.
बांद्र्याचा किल्ला : इतिहासकाळात माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे या भागाला खूप महत्त्व होते. या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी १६४० साली ‘बांद्र्याचा किल्ला’ बांधला. या किल्याचे मूळ नाव कॅस्टिला डी अगुआदा (Castella de Aguada) असे होते. या किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सागरी पुलाचे सुंदर दर्शन होते. पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याची चांगली देखभाल ठेवली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच एक पोर्तुगीज शिलालेख दिसून येतो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर (७९ फूट) उंचीपर्यंत आहे. बांद्रा किल्ल्याची पुरातत्त्व विभागाने डागडुजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्यात बांद्रा लँड अँड गार्डन या एका स्थानिक संस्थेने उभारलेली बाग आहे. किल्ल्यात जुने काही अवशेष उरलेले नाहीत. माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे ह्या भागाला खूप महत्त्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये त्यावेळी प्रचंड व्यापारी स्पर्धा होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी मुख्य समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सन १६४०मध्ये टेहळणी करणे व गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. १७३९ सालच्या चिमाजी अप्पांनी वसईवर केलेल्या स्वारीत ब्रिटिशांनी हा किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला आणि त्याप्रमाणे १७३९च्या मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला.
माउंट मेरी चर्च : पोर्तुगीजांनी सन १६४०च्या सुमारास माउंट मेरीचे कॅथोलिक चर्च बांधले होते. सन १७३८मध्ये मराठ्यांनी त्यांच्या हल्ल्याच्या वेळी चर्च नष्ट केले गेले. त्या वेळी समुद्रात टाकलेली व्हर्जिनची मूर्ती समुद्रातून मच्छिमारांकडून शोधून मिळविण्यात आली व तात्पुरत्या स्वरूपात सेंट अँड्र्यूज चर्चमध्ये तात्पुरती स्थापित केली गेली. त्यानंतर सन १७६१मध्ये नव्याने बांधलेल्या माउंट मेरीच्या चर्चमध्ये स्थापन करण्यात आली. सन १९०४मध्ये बांधलेल्या चर्चचे आर्किटेक्ट शाहपूरजी चंदाभॉय होते. जमसेटजी जीजीभॉय यांनी माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम करून दिले होते. म्हणून त्याला बोमनजींच्या पायऱ्या असे म्हणतात. येथे ‘बांद्रा फेस्टिव्हल’ म्हणून मोठा उत्सव साजरा होतो.
वांद्रे तलाव : हा तलाव ‘मोठा तलाव’, ‘कमळ तलाव’ म्हणून ओळखला जायचा. जवळ असलेल्या नौपाडा गावातील श्रीमंत कोकणी मुस्लिम व्यक्तीने हा तलाव बांधला आहे. हा तलाव एस. व्ही. रोडवर असून, तिन्ही बाजूंनी याला रेलिंग करण्यात आले आहे. एस. व्ही. रोडच्या कडेला पाम झाडे लावलेली असून, बसण्याची सोय केलेली आहे. त्याला विवेकानंद सरोवर असे नाव देण्यात आले आहे. ९०च्या दशकात या तलावात पॅडल बोटिंग सुविधा आणि मत्स्यपालनाचे उपक्रम राबविले होते. परंतु त्यानंतर ते बंद आहेत. हा तलाव महापालिकेच्या ताब्यात आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल : दक्षिण मुंबई महानगर भागात दाट वस्ती व रहदारी असल्याने, वाढत चालल्याने, उपनगरामध्ये मुंबईबाहेरील व्यवसाय जिल्हा बनविण्याची गरज व मागणी वाढली. त्यानुसार २०००च्या दशकात, शहराच्या पूर्व भागात वांद्रे-कुर्ला सीमेजवळ मिठी नदी परिसरातील जमीन संपादित करण्यात आली. तेथे मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले. या नव्याने स्थापन झालेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात ब्लॅकस्टोन, गुगल आणि अॅमेझॉन यांसारख्या अनेक इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यात आले आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट आणि कफ परेड भागात झालेल्या व्यवसायाचे विकेंद्रीकरण करून गर्दी कमी करणे, तसेच रोजगाराच्या संधी वाढविणे हा या संकुलाचा उद्देश आहे. अशा प्रकारचे नव्याने वाढविलेले पहिलेच व्यापारी संकुल आहे. येथे अनेक राष्ट्रीयीकृत, तसेच शेड्युल्ड बँकांची मुख्यालये, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेबी, नाबार्ड हेड ऑफिस, आयएल अँड एफएस, अॅमेझॉन डॉट कॉम, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, डो केमिकल्स, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, फॉर्च्युन २००० आणि जिओगार्डन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, युनायटेड स्टेट्स मुंबई दूतावास आणि ब्रिटिश उप-उच्चायुक्त यांची मुख्यालये आहेत. संपूर्ण बीकेसीमध्ये अंदाजे चार लाख लोक विविध कार्यालयांमध्ये काम करत आहेत. सन १९७७मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलाच्या नियोजन व विकासासाठी एमएमआरडीएची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यात मिठी नदी, वाकोला नाला आणि माहीम खाडीच्या दोन्ही बाजूंनी एकत्रित ३७० हेक्टर जमीन आहे. पाण्याचा निचरा होण्याच्या व्यवस्थेसह यावर रुंद रस्ते विकसित करण्यात आले आहेत.
वांद्रे कला पथ : वांद्रे यथील चॅपल रोड आणि वेरोनिका स्ट्रीटच्या आसपासच्या भागात भित्तिचित्रणाची रेलचेल असलेला अनोखा कला पथ आहे. येथे विविध प्रकारची भित्तिचित्रे असतात. त्यात लक्षवेधक कार्टून, वारली पेंटिंग, छाप, व्यक्तिचित्रे इत्यादींचा समावेश आहे. गोमेझसारख्या जगभरात नामांकित कलाकारांनी या भिंतींवर कामे तयार केली आहेत. सेंट + आर्ट मुंबई, बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट आणि धारावी आर्ट रूम अशा काही संस्था आहेत, ज्या कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) पाठबळ आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथील एमटीएनएल इमारतीवरील दादासाहेब फाळके यांच्या १२० बाय १५० फूट पोर्ट्रेटचा समावेश आहे. २०१४मधील उत्सवात रणजित दहिया (बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टमधील) मुनीर बुखारी आणि नीलेश खराडे यांच्यासह इतर कलाकारांनी मुंबई फेस्टिव्हलचा भाग म्हणून तयार केले होते. म्युरलचे अनावरण अमिताभ बच्चन आणि पीयूष पांडे यांनी केले होते. हे आशियातील सर्वांत मोठे भित्तिचित्र आहे. अशा प्रकारची अनेक चित्रे बघताना मजा येते.
बँडस्टँड बीच : वांद्रे किल्ल्याजवळच हा बीच आहे. येथील सूर्यास्ताचे चित्र खूपच छान दिसते. मोकळी हवा, पार्किंगची चांगली व्यवस्था, फॅशनेबल माणसांची गर्दी यांमुळे येथे संध्याकाळी उत्साही वातावरण असते. चित्रपट दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९५४मध्ये येथे मेहबूब स्टुडिओची स्थापना केली. लवकरच हा परिसर भारतीय चित्रपट उद्योग, बॉलिवूड यांचे केंद्र बनला. येथे सन १९७०च्या दशकात रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला. बीबीआरटी वांद्रे बँडस्टँड प्रोमोनेड मुंबईतील १७ पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुंदर बाग आणि स्वच्छंद पदपथ असलेली ही मोकळी जागा विविध खासदारांनी दिलेल्या निधीतून आर्किटेक्ट पी. के. दास यांच्यासह बीबीआरटी लँड्स एंड एरिया आणि बीबीआरटी सीनियर सिटीझन्स पार्क व वांद्रे बँडस्टँड रेसिडेन्ट्स ट्रस्ट या रहिवाशांच्या संघटनेच्या प्रयत्नातून सन २०००पासून समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी ही एक विनामूल्य सुविधा पुरविली आहे.
जॉगर्स पार्क : मुंबईच्या वांद्रे येथील उद्यानासमवेत समुद्रकिनारी जॉगिंग ट्रॅक आहे. हे कार्टर रोडच्या ओटर्स क्लबच्या पुढे आहे. हे उद्यान २ मे १९९० रोजी लोकांसाठी उघडले गेले होते आणि आठवड्यात दोन हजारांहून अधिक अभ्यागत येतात आणि रविवारी त्यांची संख्या दुप्पट होते. त्याचा जॉगिंग ट्रॅक ४०० मीटर लांबीचा आहे. यात चालण्यासाठी मातीची पट्टी आणि चालणे किंवा जॉगिंगसाठी दोन पक्के ट्रॅक आहेत. या उद्यानाच्या विकासाचे श्रेय शहरातील दिग्गज हॉकी प्रशिक्षक आणि माजी नगरसेवक ऑलिव्हर अँड्रेड यांना दिले जाते. जॉगर्स पार्कची संकल्पना त्यांचीच. त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या (कचरा डेपो) रहेजा, लोखंडवाला आणि रिझवी बिल्डर्सच्या आर्थिक मदतीने डम्पिंग ग्राउंडमधून जॉगिंग ट्रॅकमध्ये जागेचे रूपांतर केले.
‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या धोबी तलाव परिसरातील ठिकाणांची...
धोबी तलाव :
एल्फिन्स्टन कॉलेज : हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. नाना शंकरशेट यांच्या पुढाकारातून १८२४मध्ये बॉम्बे ऑफ नेटिव्ह स्कूल सोसायटीची स्थापना झाली व मुंबईत व्यापाराबरोबर शिक्षणही आले. पुढे याच संस्थेचे एल्फिस्टन एज्युकेशन सोसायटी असे नाव झाले. सन १८५६मध्ये हे कॉलेज सुरू झाले. मुंबई हे सागरी व्यापार आणि व्यापारातील समृद्ध केंद्र होते. या दोन संस्थांच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये शैक्षणिक सुविधांना सुरुवात झाली. या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या, तसेच संस्थेशी संबंध असलेल्यांमध्ये लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीरचंद गांधी, बद्रुद्दीन तैबजी, फिरोजशाह मेहता, नानाभाऊ हरिदास, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, जमशेटजी टाटा आणि प्रख्यात प्राध्यापक दादाभाई नौरोजी यांचा समावेश आहे. या संस्थेची इमारत खूपच देखणी आहे.
कामा हॉस्पिटल : महिला आणि मुलांसाठी महापालिका पथावर एल्फिन्स्टन कॉलेजजवळ हे हॉस्पिटल आहे. २२ नोव्हेंबर १८८३ रोजी ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते इमारतीची पायाभरणी केली गेली आणि ३० जुलै १८८६ रोजी ही इमारत पूर्ण झाली. मुनचेरजी कावसजी मुर्ज़बान यांनी मध्ययुगीन गॉथिक शैलीत ही इमारत तयार केली होती. पोरबंदरकडून मिळालेल्या दगडापासून ही इमारत बनविली आहे. पेस्तनजी हार्मूसजी कामा यांनी त्याच्या बांधकामासाठी त्या वेळी एक लाख रुपये देणगी दिली होती. हे हॉस्पिटल २६/११च्या हल्ल्यामुळे चर्चेत आले. अजमल कसाब व त्याचा साथीदार छत्रपती टर्मिनस वर गोळीबार करून येथे आले; पण येथील नर्सच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला.
बॉम्बे जिमखाना मैदान : हा भारतातील पहिला जिमखाना आहे. सन १८७५मध्ये याची स्थापना झाली. क्लबहाउसचे संकल्पचित्र ब्रिटिश आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी काढले आहे. लॉबी, टेबल टेनिस क्षेत्र, बॅडमिंटन कोर्ट, रेस्टॉरंट आणि लाउंज म्हणून काम करणारी एक लांब इमारत असलेला हा सुसज्ज असा जिमखाना आहे. येथे हिवाळ्यातील महिन्यांत क्रिकेट खेळले जाते. पावसाळ्याच्या महिन्यांत रग्बी आणि फुटबॉल साठी मैदान वापरले जाते. सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिला कसोटी सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी येथे खेळला गेला. तात्पुरती शेड करून त्यामध्ये ५० हजार प्रेक्षकांसाठी स्टँड लावले गेले होते. १० डिसेंबर २००२ रोजी अपंगांनी खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना येथे पार पडला. या जिमखान्यामध्ये तीन बॅडमिंटन कोर्ट, पाच स्क्वॅश कोर्ट, सहा टेनिस कोर्ट, बिलियर्डस् आणि स्नूकरसाठी सहा टेबल्स, एक जलतरण तलाव आणि एक फिटनेस सेंटर आहे. या क्लबच्या मेंबरशिपसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ पुरुषांनाच क्लबमध्ये सदस्यत्व मिळायचे. आता स्त्रियांनाही मिळते. आझाद मैदान आणि जिमखाना यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट येथे जाण्यासाठी छोटी लेन आहे.
आझाद मैदान : आझाद मैदान हे मुंबईमधील ऐतिहासिक मैदान आहे. क्रिकेट आणि राजकीय पक्षांची आंदोलने यामुळे हे मैदान सतत चर्चेत राहिले आहे. २५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानाने अनेक क्रिकेटचे सामने पाहिले, अनेक खेळाडूही घडवले. २८ डिसेंबर १९३१ रोजी महात्मा गांधींनी याच मैदानावर मोठी सभा घेतली होती. याच्या दक्षिण बाजूला चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानचा छोटा संपर्क रस्ता आहे. त्याच्या पलीकडे मुंबई जिमखाना आहे. मैदानाच्या पूर्व बाजूस महापालिका मार्गास लागून मुबई मराठी पत्रकार संघाचे कार्यालय आहे.
फॅशन स्ट्रीट : हे मुंबईतील सर्वाधिक खरेदीचे ठिकाण आहे. पर्यटक आणि मुंबईतील ग्राहकांचे आवडते ठिकाण आहे. सांगितलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत जेथे खरेदी करता येईल असे ठिकाण म्हणजे फॅशन स्ट्रीट. येथे प्रामुख्याने रेडिमेड कपडे, पादत्राणे, तसेच नॉव्हेल्टीज स्वस्त किमतीत मिळतात. अगदी मंडईत घासाघीस चालते तशी येथे चालते; मात्र खरेदीकरताना सावधानता घ्यायला हवी. आझाद मैदानाच्या पलीकडील महात्मा गांधी रस्त्याकडे क्रॉस मैदानापर्यंत सुमारे ३०० ते ४०० दुकाने आहेत.
कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai)
चोर बाजार - मुंबापुरीची खासियत
बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.
‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.
‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.
‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.
त्याशिवाय मुंबईत भाजी बाजार (भायखळा मंडई), कांदेबटाटे बाजार (डंकन रोड), फूल बाजार (भुलेश्वर), तांबाकाटा किंवा तांबट आळी (तांब्या-पितळेची भांडी), लोहार आळी-चाळ (हार्डवेअर), चिऱ्याचा बाजार (धोबी तलाव), कापड बाजार (मंगलदास व मुळजी जेठा मार्केट), पान बाजार (खेतवाडी), बांगडी बाजार, खांड बाजार, बोरा बाजार, क्वाटल बाजार (दावण किंवा दोरखंड), कुंभार तुकडा, गोणपाट बाजार, कॉटन बाजार (कॉटन ग्रीन), क्रॉफर्ड मार्केट तसेच नळ बाजार असे विविध प्रकारचे बाजार १८६५ ते १८७० या काळात बांधले गेले. नळबाजाराशेजारी भिकार बाजारही होता. लोक दारावर भिक्षा मागण्यास आलेल्या भिकाऱ्यांच्या (यामध्ये साधू-बैरागी वगैरे सर्व प्रकार येत) झोळीमध्ये मूठभर धान्य घालत. ते भिकारी गहू, तांदूळ व ज्वारी यांसाठी वेगवेगळ्या झोळ्या ठेवत. दिवसभर जमा झालेले धान्य दिवस मावळताना भिकार बाजारात नेऊन विकत. शहरातील गरीब लोक भिकाऱ्यांनी, साधू-बैराग्यांनी जमा करून आणलेले ते धान्य भिकार बाजारातून स्वस्त दरात खरेदी करत.
काळाच्या ओघात तेथील काही बाजार बंद पडले, तर काही स्थालांतरित झाले.
ग्रँट रोडवरील रिपनचा (ऑल्फ्रेड टॉकिज) नाका म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासातील एकेकाळचा सर्वात गजबजलेला नाका! नाट्य, तमाशा आणि सिनेमाची पंढरी! त्याच्या आसपासचा पिला हाऊस परिसर म्हणजे गरीब जनतेची शारीरिक भूक भागवणारा मोहमयी बाजार! तर ग्रँट रोडच्या पवनपुला (केनेडी ब्रिज) खाली रेल्वे लाइनला खेटून नृत्यसंगीताचा बाजार होता.
मुंबईतील सर्वांत जुना, वर्षानुवर्षे चालत आलेला, गरीब जनतेला, हौशी-छांदिष्ट संग्राहकांना वरदान ठरलेला, आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण बाजार आहे तो म्हणजे जुना बाजार ऊर्फ चोर बाजार!
चोर बाजार हा मुळात जुन्या कपड्यांचा बाजार! तेथे पुढील काळात जुन्यापुराण्या नानाविध तऱ्हांच्या वस्तू विक्रीस येऊ लागल्या. त्या जुन्या बाजाराचे ‘चोर बाजार’ नामकरण कसे झाले? त्याचा किस्सा त्या बाजारातच ऐकायला मिळतो. मरीन लाइन्सच्या सोनापूर भागात, हिंदू दहनभूमीत प्रेते जाळल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असे. त्यामुळे चिराबाजार व धोबीतलाव परिसरातील किरिस्ताव व पारशी लोकांनी त्या स्मशानभूमीस आक्षेप घेतला. त्यांनी स्थानिक ब्रिटिश सरकार जुमानत नाही म्हणून इंग्लंडमध्ये थेट व्हाईसरॉयला पत्रे पाठवली. तेव्हा व्हाईसरॉय जातीने हिंदुस्मशानभूमीमुळे खरोखरच दुर्गंधी पसरते की नाही ते पाहण्यासाठी मुंबईला आले होते. त्यावेळी सँडहर्स्ट रोडवरून जाताना त्यांच्या कानी, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यांतून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराणा सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बे पैसा’ असे तारसप्तकात ओरडत माल विकणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज पडला. लोकवस्ती विरळ असल्याने व गाड्यांची रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा व्हाईसरॉयनी फेरीवाल्यांच्या आवाजाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून नाक मुरडले होते. त्यावरून त्या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला. मुंबईतील शर्विलकांनीही त्यांच्या हस्तकौशल्याने, चलाखीने अनेकांना त्यांचा ‘हिसका’ दाखवून त्या बाजाराचे ‘चोर बाजार’ हे नाव सार्थ केले!
इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया मुंबई भेटीस आली असताना तिच्या मूल्यवान सामानातून तिचे आवडते ‘व्हायोलिन’ गायब झाले होते. काही दिवसांनी, ते चोर बाजारातून जुने सामान म्हणून विक्रीसाठी आले, तेव्हा पोलिसांना सापडले. चाळीस वर्षांपूर्वी राजकुमार या सिनेअभिनेत्याचे चोरीस गेलेले किंमती घड्याळही पोलिसांनी तेथूनच जप्त केले होते.
हैदराबादचे
धनाढ्य नवाब सालारजंगचे वंशज अलियावर जंग हे मुंबईचे गव्हर्नर होते. ते
वाळकेश्वरला राजभवनात राहत. एके दिवशी, एका चोराने समुद्रमार्गे येऊन,
राजभवनच्या मागच्या बाजूने अलियावर जंगसाहेबांच्या शयनगृहात प्रवेश केला
आणि तेथील अलमाऱ्यांतील त्यांचे कपडे चोरून पोबारा केला. त्या घटनेने मुंबई
पोलिसांची झोप उडाली. पोलिसांना राजभवनात इतकी कडक सुरक्षा व्यवस्था
असतानाही तेथे चोरी झालीच कशी ते कळत नव्हते. मात्र आठ-दहा दिवसानंतर त्या
बुद्धिमान चोराचे दुर्दैव आड आले. तो ‘चोरांच्या आळंदीत’ म्हणजे ‘चोर
बाजारा’त साहेबांचे कपडे विकताना पकडला गेला. त्याचे दुर्दैव अशासाठी, की
त्याने चुकीच्या माणसाचे कपडे चोरले होते. शेरवानी, कुर्ते, कोट, गाऊन्स
असे, हैदराबादी नवाबाचे उंची, भारी किंमतीचे कपडे विकत घ्यायला कोणीही
माईचा लाल पुढे येईना! फक्त कोटाची सोन्याची बटणे तेवढी विकली गेली! काही
वेळा वाटते, की अशा शर्विलकांचे फोटो फ्रेम करून चोरा बाजारात लावले गेले
पाहिजे होते. शेवटी चौर्यकर्म हीसुद्धा चौसष्ट कलांपैकी एक कलाच आहे. चोर
बाजारातील एक चाचा मला कौतुकाने म्हणाले होते, ‘मालिक ऐसी हुन्नर (कला)
बहुत कम लोगोको देता है.’
नळ बाजारासमोरच्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवरून (जुना सँडहर्स्ट रोड) मौलाना आझाद रोडकडे (जे. जे. हॉस्पिटल रोड) जाणाऱ्या मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट, मोची गल्ली या सर्वसाधारण परिसराला चोर बाजार म्हणून संबोधले जाते. त्यामध्ये मिनी मार्केट, मुघल बाजार, चिंधी गल्ली, बोहरी मोहल्ला, गुजर स्ट्रीट, बारा इमाम रोड यांसारखे भाग आहेत.
मॉर्टन नामक ब्रिटिश इंजिनीयरने नळ बाजार मंडई उभी केली. त्यातील मटण आणि मच्छी मंडईच्या समोरील गल्लीला त्यांचे नाव दिले गेले होते. नळ बाजारातील कसाई लोकांनी मॉर्टन स्ट्रीटचे ‘मटण स्ट्रीट’ असे नामकरण केले. मटण स्ट्रीटवर मटणाचे दुकान नव्हते आणि आजही नाही. शेजारीच चिमणा बुचर स्ट्रीट आहे. रस्त्याला कसायाचे नाव असले तरी तेथे बकरे कापले जात नाहीत. तेथे फक्त गाडीचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) मिळतात. मोची गल्लीत मात्र अजूनही मोची राहतात व तेथे नवे-जुने जुतेही मिळतात.
नळ बाजारासमोर, मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट व सैफी ज्युबली स्ट्रीट या गल्ल्यांच्या तोंडावर हार्डवेअर बाजार आहे. तेथे सर्व प्रकारचे व आकाराचे खिळे, स्क्रू, हातोड्या, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने (स्पॅनर), कात्र्या, करवती (लोहार व सुतार सामान), छिन्नी, तराजू, साखळ्या (चेन्स), वजने, मापे, डंबेल्स, व्यायामशाळेतील लोखंडी सामान, रोलर स्केटिंग, सर्व प्रकारची छोटी छोटी चाके, नट बोल्ट्स, रंगांचे ब्रश, विविध प्रकारच्या स्प्रिंग्ज, बाथरूम फिटिंग्ज आदी सामान मिळते. रोजंदारीवर अथवा कंत्राटावर काम करणारे सुतार, plumber, रंगारी, कडिया, हमाल, मांडव बांधणारे असे कारागिर-बिगारी लोक दोन टाकी परिसरात रस्त्यावर दीड-दोनशे वर्षांपासून दररोज सकाळी उभे असतात. पूर्वी मटण स्ट्रीटच्या तोंडाशी फूटकळ सामानांच्या गाड्या उभ्या असत. त्या गाड्यांवर बटण चाकू, रामपुरी चाकू, खटक्यांचे चाकू, दुहेरी धार असलेले, करवतीसारखे पाने असलेले सुरे, खंजीर, कोयते, कुऱ्हाडी, वस्तरे, फाइट (पुढे टाके असलेल्या लोखंडी अंगठ्या), गुप्त्या (मुठीच्या काठीत लांब धारदार पाते असलेल्या सुऱ्या), विळ्या, नारळ खोवणी, स्वयंपाकघरातील सुऱ्या आदी सामान मिळे. मुंबईतील गुंड लोक प्राणघातक हत्यारे पंचवीस वर्षेंपूर्वीपर्यंत तेथूनच खुलेआम खरेदी करत. नंतर पोलिसांची बंदी आली. पूर्वी त्या रस्त्यावर विविध प्रकारच्या टोप्यांची दुकाने होती. तेथे काश्मिरी, इराणी, बोहरी, तुर्की, फारसी, अरबी या लोकांच्या रंगीबेरंगी टोप्या मिळत.
चोर बाजारात साधारणत: पाचशे स्टॉल्स (टपऱ्या) आणि दुकाने आहेत. काही टपऱ्या दोन ते तीन फूट लहान आहेत. काही जवळपासच्या भागात मोठमोठी गोदामेही आहेत. तेथील व्यापारी कितीही मोठे गिऱ्हाईक असले तरी त्याला त्याच्या गोदामात घेऊन जात नाहीत. आधी कळवल्यास ‘माल’ दुकानात आणून ठेवतात.
चोर बाजारात अॅण्टिक (दुर्मीळ) वस्तूंची जवळ जवळ पावणेदोनशे दुकाने आहेत. बाजारात काठेवाडी मुस्लिम लोकांचे प्राबल्य आहे. पूर्वी बाजारात काळे जाकिट व लाल गोंड्यांची तुर्की टोपी घातलेले ‘चाचा’ दिसत. सध्या तेथे मन्सुरी, खोडा, मेमन, युपीचे भय्ये, हैदराबादी व्यापारी आहेत. काही बोहरी जुने फर्निचर व काच सामानाच्या धंद्यात आहेत. तेथील दुकानदार स्वत:ची नावे, दुकानाचा नंबर, टेलिफोन नंबर पाटीवर लिहून ती दुकानाबाहेर लावतात. त्या पाट्यांवर दुकानात कोणत्या प्रकारचा माल विकला जातो याचेही चिन्ह बहुधा असते.
‘जरी’चा धंदा हा चोर बाजारातील सर्वात पुरातन धंदा! गेल्या शतकापर्यंत मुंबईतील पाठारे प्रभू, शणवी, खत्री, सोनार, पाचकळशी, सीकेपी, सारस्वत ब्राह्मण अशा समाजातील घरंदाज सधन स्त्रिया जरीचे काठ असलेले शालू व पैठण्या सर्रास नेसत. पाठीवर शेले घेत. पुरुषमंडळीसुद्धा अल्पाक, शार्कस्किनचा कोट परिधान करत. पूजेसाठी भरजरी पीतांबर अथवा कद नेसत. त्यांच्या जुन्या कपड्यांना चोर बाजारात सोन्याचा भाव येत असे. जरीकाठी शालू आणि पैठणी यांतून सोने, चांदी निघत असे.
चाळीत, जुन्या इमारतीत, घराबाहेर, गॅलरीत, गच्चीवर वाळत घातलेले कपडे, तसेच लाँड्रीतून गहाळ झालेले कपडे पहाटेच्या वेळी चोरबाजारात येतात. मध्यमवर्गीय लोक जुने कपडे बोहारणी अथवा वाघरीणींना (काठेवाडी बायकांना) देतात. ते कपडेसुद्धा चोर बाजारात विक्रीस येतात. रेडिमेड गारमेंटचा डिफेक्टिव्ह माल, तसेच उल्हासनगर-धारावीमधून तयार झालेला माल प्रसिद्ध कंपन्यांची लेबले लावून डुप्लिकेट रूपात तेथे येतो. कपडे लाँड्रीचा मार्क नाहीसा करून, मळके डाग पडलेले कपडे धुऊन इस्त्री करून नव्याने पुन्हा बाजारात येतात. सायंकाळच्या मंद प्रकाशात ते जुने कपडे ओळखूही येत नाहीत. त्या व्यवहारात व्यापारीही खूश आणि गिर्हाकईकही खूष!
एका बाजाराचे नाव मुघल बाजार जरी असले, तरी त्या ठिकाणी मुघलकालीन कोणत्याही वस्तू मिळत नाहीत. तो बाजार हरी मशिदीजवळ असून तेथे लहानमोठ्या जहाजावरील फूटकळ सामान विकणारी आठ-दहा दुकाने आहेत. सुकाणू (जहाजाचे गोल स्टिअरिंग व्हिल), विविध प्रकारचे नांगर, दुर्बिणी, जहाज नांगर टाकते त्यावेळी वाजवली जाणारी घंटा, नेव्हिगेशनचे रंगीत दिवे, बॅटरी चार्जर्स, लाइफ जॅकेट्स, जहाजावर वापरली जाणारी दिशा-वारा-पर्जन्य-भरती-ओहोटी-स्टॅबिलिटी यांची दर्शक मीटर्स किंवा यंत्रे आदी सामान विक्रीस ठेवलेले असते. त्यातील बहुतेक सामान परदेशी कंपन्यांचे व टिकाऊ असते. मुघल बाजारात त्या वस्तूंची मोठी गोदामे आहेत.
‘हरी मशिदी’समोर मिनी मार्केट आहे. तेथे फुटकळ वस्तू विकत मिळतात. रस्त्यावर पेन्सिली, बटणे, दो-यांची रिळे, सुया, विणकामाचे साहित्य विक्रीसाठी ठेवलेले दिसते.
कालबाह्य
झालेल्या, अपघातात छिन्नविच्छिन्न होऊन गेलेल्या देशी-विदेशी कंपन्यांच्या
मोटारगाड्या, मोटर सायकली कमीत कमी किंमतीत हस्तांतरित होत असतात. शेवटी,
त्या निकामी, टाकाऊ होत जातात. त्यावर अधिक खर्च करणे व्यावहारिकदृष्ट्या
मूर्खपणाचे ठरते. तशा अवस्थेतील एके काळच्या आलिशान गाड्या, हातगाडीवरून
शेवटच्या क्रियाकर्मासाठी चोरबाजारात दाखल होतात! बारा इमाम रोडवरील
गॅरेजेस म्हणजे तशा गाड्यांचे अस्तित्त्व नष्ट करणारी स्मशानभूमी! मेडिकल
कॉलेजमध्ये निष्णात सर्जन शवविच्छेदन करून बेवारस प्रेतांचे अवयव अलगद
काढून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देतात, तसे बारा इमाम रोडवरील कुशल
मॅकेनिक चार तासांत स्क्रू-ड्रायव्हर, छिन्नी व हातोडा यांच्या साहाय्याने
त्या गाड्यांचे पार्ट मोकळे करून मालकांना देतात. गाडीचा उरलेला सांगाडा,
सडलेले पत्रे, निरुपयोगी पार्ट भंगारवाल्याला विकून टाकतात. जुन्या
गाड्यांचे ते सुटे पार्ट मालकांना कधी कधी दामदुप्पट किंमत मिळवून देतात!
पाऊणशे वर्षांपूर्वीच्या हौशी मालकांनी कौतुकाने सांभाळलेल्या काही
व्हिंटेज गाड्या मुंबईच्या रस्त्यावर रॅलिजमध्ये धावताना अथवा प्रदर्शनात
उभ्या असलेल्या दिसतात. त्याचे श्रेय ‘चोर बाजारा’ला जाते. कारण त्या
गाड्यांना लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग चढ्या भावात का होईना, फक्त चोर
बाजारातील गॅरेजवाले पुरवू शकतात. प्रसिद्ध फिल्मी संगीतवादक कलाकार केरसी
लॉर्ड याने किस्सा सांगितला होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी हौसेने
सेंकड हँड गाडी घेतली होती. त्या गाडीच्या दोन चाकांवर व्हिलकॅप नव्हती.
त्यांचा ड्रायव्हर जयसिंग त्या विकत घेण्यासाठी सकाळीच चोर बाजारात गेला.
तेथील माणसाने गाडीचा मेक व इतर माहिती घेतल्यावर, ‘आप यही रूको, अभी मैं
व्हिलकॅप लेके आता हूँ ’ असे म्हणत पाच मिनिटांत दोन नव्या व्हिलकॅप
आणल्या. जयसिंग त्या पॅक करून पैसे देऊन घरी आला. दुपारी तो त्या कॅप
चाकांना बसवायला गेला, पाहतो तर काय, पहिल्या दोन्ही चाकांच्या व्हिलकॅप
गायब! चोरबाजारातील त्या अनोळखी माणसाने गाडीच्या (लतादीदींच्या) दोन
व्हिलकॅप्स काढून त्या जयसिंगलाच विकल्या होत्या!
चिंधी गल्लीशेजारच्या मोची गल्लीत पादत्राणांचा (चपला, बुटांचा) बाजार आहे. त्यास चप्पल बाजार म्हटले जाते. तेथे चपला-बूट बनवून विकले जातात. महाराष्ट्रात हजारो देवळे आहेत. देवळाबाहेर भाविकांचे जोडे चोरणारे शेकडो भुरटे चोर, त्यांनी चोरलेले जोडे मोची गल्लीत विकतात. दंगलीच्या काळात चोरलेला मालही तेथे येतो. पाश्चात्य कंपनींच्या ब्रँडेड शूजना (बुटांना) मोठी मागणी आहे. त्यांच्या किंमतीही फार असतात. ते शूज चोरून, चप्पलबाजारात आणले जातात. बाजारात पाश्चात्य कंपनीचे नकली शूजही पाहायला मिळतात. तेथे कमी किंमतीत तशा प्रकारचे शूज मिळतील.
काही वेळा चांगला शेलका मालही बाजारात हाती लागतो. बाजारातील फेरीवाले आणि मोची सांगली, कोल्हापूर, मिरज या भागातील असल्याने त्यांच्याशी मराठीत बोलणे श्रेयस्कर! मातृभाषेत बोलल्यामुळे व्यवहारात आपलेपणा येतो. मी त्या बाजारात चपला व बूट आणण्यास गेलो होतो. मी दुकानात बसलेल्या मावशींना सांगितले, की मी येथे नेहमी येत असल्याने भावासाठी उगाच घासाघीस करत नाही. मला जुने पण चांगल्या प्रतिष्ठित कंपनीचे जोडे व चामड्याची मजबूत चप्पल हवी आहे. तेव्हा लॉटमधील माल मला तुम्हीच काढून द्या. तिने मला खरोखरीच चांगला माल काढून दिला. बूटाचे अडीचशे व चप्पलेचे शंभर रुपये असे तिने फक्त साडेतीनशे रुपये माझ्याकडून घेतले. मी तोच माल एखाद्या दुकानातून घेतला असता तर मला कमीत कमी दीड हजार रुपये तरी द्यावे लागले असते. इतक्या स्वस्तात माल विकणे तुम्हाला कसे परवडते असे विचारल्यावर, ती म्हणाली, “आम्ही खानदानी मोची म्हणजे चांभार. आम्ही स्वत: माल बनवतो पण आम्हाला चामड्याची साधी चप्पल चारशे रुपयांच्या खाली देणे परवडत नाही. पण चोरांना माल फुकटच मिळालेला असतो. ते आम्ही देऊ ती किंमत घेऊन आनंदाने जातात. मी ही चप्पल पन्नास रुपयांत, तर बूट दीडशे रुपयांत घेतले. यात माझा व गिऱ्हाईकाचा असा दोघांचाही फायदा असतो. पूर्वी देवळातून चोरलेला माल यायचा, पण आजकाल तो माल कमी झाला आहे. सध्या कार्यक्रमाचे हॉल असतात तेथून माल येतो. तुला जो माल दिला तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातील होता.” गिऱ्हाइकाने व्यापाऱ्यावर विश्वास दाखवला तर तोही त्याच्यावर विश्वास ठेवतो.
मुस्लिम बांधवांचा ‘जुम्मा’ किंवा शुक्रवार हा प्राथनेचा दिवस असतो. त्या दिवशी चोरबाजारातील सर्व दुकाने व स्टॉल्स दिवसभर बंद असतात. परंतु दर शुक्रवारी, भल्या पहाटेपासून बाजाराला जाग येते. दूरदूरचे फेरीवाले त्यांचे किंमती सामान पाट्या, हातगाड्या-टेम्पोत भरून बाजारात घेऊन येतात. बाजार सकाळी सात वाजेपर्यंत नटूनथटून तयार असतो. फेरीवाल्यांच्या रस्त्यावर बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यासाठी ते स्थानिक दुकानदारांना दिवसाचे भाडेही देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शेजारच्या राज्यांतून अनेक लोक जुन्या, दुर्मीळ वस्तू विकण्यास बाजारात येतात. त्या मालाला ग्राहकांची चांगली मागणी असते. चोखंदळ ग्राहक त्यातील निवडक, शेलका माल पडेल त्या किंमतीस उचलण्यास तयार असतो. कारण ती दुर्मीळ वस्तू पुन्हा हाती लागेल याची शाश्वती नसते. तेथे येणारा बहुतेक माल जुना, वापरलेला अथवा चोरलेला असल्याने त्याची किंमतही बरीच कमी असते. ग्राहकाला तेथील सौंदर्यपूर्ण, कलात्मक वस्तूंची भुरळ पडते. तेथे हौसेला मोल नसते. वस्तू पाहताक्षणी आवडणे सर्वांत महत्त्वाचे असते. ग्राहक त्यांच्या पूर्वजांची आठवण म्हणून, छंद जोपासण्यासाठी, त्यांचा स्वत:चा संग्रह वाढवण्यासाठी, तर कधी घराच्या सजावटीसाठी ती खरेदी करत असतात. तेथील प्रत्येक वस्तूच्यामागे इतिहास दडलेला असतो. अँटिक अथवा जुन्या वस्तूची किंमत तिच्या दुर्मीळपणावर ठरते. विक्रेत्याची पैशांची गरज आणि ग्राहकाला वस्तूची गरज यावर सौदा ठरवला जातो. त्या दुर्मीळ वस्तूची किंमत काहीही असू शकते. त्यावेळी ग्राहकाचे ‘लक’ महत्त्वाचे असते.
मुंबईत दोन-तीन शतकांपूर्वी पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, यहुदी यांसारखे अनेक पाश्चात्य लोक राहत होते. भारताचे अनेक देशांबरोबर व्यापारी संबंध होते. ती विदेशी मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या चीजवस्तू भारतात सोडून मायदेशी परत गेली. त्यांनी वापरलेल्या त्या चीजवस्तू या ना त्या मार्गाने चोर बाजारात आल्या. त्याशिवाय अनेक इतिहासप्रसिद्ध शहरांतील संस्थानांचे जुने राजवाडे, जमीनदारांचे बंगले, नबाबांच्या हवेल्या लिलावात निघतात. कधी जीर्ण होऊन जमीनदोस्त होतात. पुन्हा नव्याने बांधल्या जातात. बाजारातील व्यापारी तेथील कलाकुसरीचा सर्व माल खरेदी करतात. कित्येक जण वडिलोपार्जित जुन्या वस्तू जागेच्या अडचणीमुळे, नादुरूस्त झाल्यामुळे नाममात्र किंमतीत फेरीवाल्यांना विकतात. फॅशन बदलते तशा जुन्या वस्तू ‘आऊटडेटेड’ होतात. काही वेळा हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरचे सामान विकण्याची परिस्थिती येते. फेरीवाले विक्रीस निघालेले असे सामान, अगदी पीनपासून मोठमोठी झुंबरे, हवेल्यांच्या खिडक्या दारांपर्यंतच्या वस्तू चोरबाजारात विकायला आणतात. त्यामुळे तेथे रेडिओग्राम, चेंजर, साखळी लावलेली शोभिवंत घड्याळे, जातिवंत लाकडाचे कोरीव नक्षीकाम केलेले फर्निचर, तांबा, पितळ, ब्राँझ, जस्त आदी धातूंपासून बनवलेल्या सुबक वस्तू, पेंटिंग्ज, चित्रे, राजेरजवाड्यात दिसणारे नक्षीकाम केलेले पेटारे, रांजण, गुडगुड्या, पक्ष्यांचे मोठाले पितळी पिंजरे, कलात्मक पुतळे, मूर्ती, चहाचे पेटारे, चौकोनी बरण्या, पोर्सिलीनच्या प्लेट्स, कपबश्या, कटग्लासेस, लायटर्स, अॅश ट्रेज, दारूचे मग्ज, चलनी नाणी यांसारख्या असंख्य वस्तू पाहायला मिळतात.
चोर
बाजारात भारतीय पुरातत्त्व खात्याने निर्बंध घातलेल्या हस्तिदंती,
प्राण्यांची हाडे, कातडी, केस व शिंगांपासून बनवलेल्या वस्तू,
देवादिकांच्या पंचधातूंच्या मूर्ती, शिल्पे अशा काही संरक्षक वस्तू सोडून
बाकी सर्व सामान तेथे मिळते. पुरातत्त्व विभागाची माणसे अधुनमधून बाजाराची
पाहणी करण्यास येतात. तेथे बाजारात आलेली कोणतीही जुनी दुर्मीळ वस्तू
दुरुस्त करणारे, जुनी वस्तू नवीन करण्यात वाकबगार असणारे कसबी कारागीर
आहेत. बाजारात एकदा विकलेली वस्तू कोणी परत घेत नाहीत. खरेदी-विक्रीची
पावतीही दिली जात नाही. परदेशी लोकांना विमानतळावर दाखवायला कच्ची पावती
देतात. परंतु त्यावर खरी किंमत लिहिलेली नसते.
पाच वर्षांपेक्षा जुन्या वस्तूंना सेल्सटॅक्स लागत नाही. काही व्यापारी विकलेली वस्तू अस्सल असल्याचे सर्टिफेकेट देतात.
भारतात शंभर वर्षांपेक्षा जुन्या वस्तू परदेशी पाठवण्यावर बंदी आहे. लोकांना त्यांच्या संग्रही अशा वस्तू असल्यास त्या सरकारकडे रजिस्टर कराव्या लागतात. तसे कायदे अनेक आहेत. पंरतु ते राबवण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे चोरबाजारात माल कोठून येतो व तो नंतर कोठे जातो यावर काहीच नियंत्रण नाही. अनेक जण ‘असली माला’च्या नावाखाली म्हणून नकली माल विकतात. शेलका, किंमती माल त्यांच्या गोदामात असतो. विश्वास पटल्यावर तो आणून दाखवला जातो. बाजारात परदेशी गिऱ्हाइके मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बाजारातील व्यापारी त्यांच्याशी मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलतात. त्यांपैकी काहींच्या वेबसाइटही आहेत. त्यांचा व्यवसाय इंटरनेटमुळे ग्लोबल झाला आहे. बाजारात दर शुक्रवारी कनिष्ठ, मध्यमवर्गीय, विविध वस्तूंचे छांदिष्ट, हौशी, संग्राहक, इतिहास समाजशास्त्राचे अभ्यासक, हिंदुस्थानी कारागिरी-कलाकुसर यांविषयी कुतूहल असणारे विदेशी नागरिक, बंगले, फ्लॅट, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेणारी उच्चवर्गीय व्यापारी मंडळी, स्टुडिओत सेट लावणारे तंत्रज्ञ, कारागीर इत्यादी मंडळी पंढरीच्या यात्रेकरूंसारखे नित्यनेमाने, भक्तिभावाने तेथे येतात. बाजारातून, जुन्या काळाची वातावरण निर्मिती करण्यासाठी हंड्या, झुंबरे, दिवे, गालिचे, मोठी पेंटिंग्ज, पोर्ट्रेट, टेलिफोन, ग्रामोफोन, भिंतीवरील घड्याळे, सिनेमाची पोस्टर्स, जुन्या गाड्या आदी वस्तू सर्रास खरेदी केल्या जातात.
चोर बाजारातील व्यापाऱ्यांची दुसरी-तिसरी पिढी चालू आहे. गिऱ्हाईकांशी पहिल्यासारखा आपलेपणा दाखवला जात नाही. तेथील बुजूर्ग दुपारच्या नमाजाला गेल्यावर, तेथे बसणारी तरुण मुले मिळेल त्या किंमतीत माल विकून टाकतात. आजकाल पाश्चिमात्य गोरे लोक तेथे मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. कॉलेजच्या पोरीही हौसेने जुन्या दुर्मीळ वस्तूंच्या शोधात तेथे येतात.
चोरबाजाराचाही पुनर्विकास होणार आहे. काही श्रीमंत बोहरी लोक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. रस्त्यांवर, उघड्यावर बसणारे व्यापारी कदाचित टॉवरमध्ये जातील! पण तेथे गिऱ्हाईके जातील का? याची त्यांना शंका आहे.
- अरुण पुराणिक
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान : हे मैदान ‘शिवतीर्थ’ म्हणूनही ओळखले जाते. समुद्राच्या सान्निध्यात असलेले हे उद्यान १९२५मध्ये महापालिकेमार्फत उभारले गेले. तत्कालीन नगरसेविका अवंतिका गोखले यांच्या मागणीवरून मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी पार्क ठेवण्यात आले. या ठिकाणी १९२७मध्ये दादर हिंदू जिमखान्यामार्फत पहिले टेनिस कोर्ट स्थापन करण्यात आले. सुमारे २७ एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर हे मैदान विस्तारले आहे. यातील निम्म्याहून अधिक क्षेत्र सुमारे ३१ संस्थांच्या ताब्यात आहे. त्यात शिवाजी पार्क जिमखाना आणि बंगाल क्लब यांसारखे सर्वांत मोठे क्लब आहेत. उर्वरित जागेवर खेळांचे मैदान, मुलांचे पार्क, नाना-नानी पार्क, स्काउटचे मंडप, एक गणेश मंदिर आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे. संपूर्ण मैदानाच्या बाजूने वृक्षराजीच्या असलेला बांधीव पादचारी मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरेख पुतळा येथे आहे. पूर्वेकडील उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार फक्त पादचाऱ्यांसाठी आहे. या प्रवेशद्वारावर शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्या दिवंगत पत्नी मीनाताई ठाकरे यांचा दिवा ठेवण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या मैदानाने अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या.
१९१०नंतर मात्र नागरिकांनी केलेल्या जनहितयाचिकेमुळे हे मैदान शांतात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवाजी पार्कवरून केळुस्कर मार्गावरील कोहिनूर चौकासमोरच शिवसेनेचे मुख्यालय आहे. तसेच राम गणेश गडकरी यांचे स्मारकही आहे. शिवाजी पार्क मैदान भारतीय क्रिकेटचे जन्मस्थळ मानले जाते. दिवंगत अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या प्रशिक्षकांनी जोपासलेले क्रिकेट क्लबचे हे घर आहे, ज्यांनी भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स तयार केले आहेत. यामध्ये मुंबईमधील सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सुहास गुप्ते, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, एम. एस. पाटील, दिलीप सरदेसाई, अशोक वाडेकर, पद्माकर शिवलकर, एकनाथ सोलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संदीप पाटील, अजित आगरकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर अशी कितीतरी नावे घेता येतील.
दादर चौपाटी : शिवाजी पार्कपासून अगदी जवळ ही चौपाटी आहे. हा एक छोटा किनारा आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. लोक येथे सूर्यास्त दृश्य आणि वांद्रे-वरळी सीलिंक पुलाचे सुंदर दृश्य पाहण्यास येतात. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर सागरी सेतूवरील पथदिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळून जातो. वांद्र्यापासून वरळीपर्यंत सागरी सेतू असल्याने समोर आकाशदिव्यांची माळ असल्यासारखे वाटते.
वरळी किल्ला : वरळी हा दादरचे दक्षिणेकडील एक परिसर आहे. बहुधा वारली या शब्दावरून हे नाव आले असावे. वरळी येथे किल्ल्याची बांधणी पोर्तुगीजांनी १५६१ साली केली. खाली रुंद व वर निमुळत्या तटबंदीच्या भिंती, त्यावर त्रिकोणाकृती बुरुज आणि ह्या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी मनोरा इत्यादी पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यात दिसून येतात. मुंबई बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाले, त्या वेळी ह्या किल्लाचा ताबा ब्रिटिशांना मिळाला. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्तवार्षिक युद्धात वरळी किल्ल्यावर जादा शिबंदी आणि तोफा ठेवण्यात आल्या होत्या, असे उल्लेख मिळतात. वरळी कोळीवाड्यातील छोट्याशा रस्त्याने किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरुवातीला जोत्याच्या उंचीपर्यंत आणि नंतर दरवाज्याच्या उंचीपर्यंत जातात. त्यामुळे भारदस्त वाटते. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी विहीर आहे. विहिरीचा आतील भाग तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असून, विहिरीला वर्षभर पाणी असते. पोर्तुगीजांनी मुंबई परिसरात बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे. तटबंदीवर खाचा ठेवून तोफा ठेवण्यासाठी जागा करण्यात आलेली दिसून येते. वांद्रे-वरळी सी-लिंकवरून जाताना ह्या किल्ल्यावरील मनोरा लक्ष वेधून घेतो, घंटा बांधण्यासाठी हा मनोरा बांधला होता.
पिरामल संग्रहालय : हे वरळी भागात मध्यभागी असलेले एक अत्याधुनिक संग्रहालय आहे. येथे प्रेक्षकांना आकर्षक, माहितीपूर्ण आणि शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त कलांचे सादरीकरण केले जाते. या संग्रहालयात नियमितपणे पिरामल संग्रहातील आणि इतर संग्रहातून आलेल्या नावीन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतात. पिरामल आर्ट फाउंडेशन ही डॉ. स्वाती पिरामल आणि अजय पिरामल आणि पिरामल कुटुंबीयांनी भारतीय कलेचा संग्रह, जतन आणि प्रदर्शन यांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून कलेबद्दल दुर्मीळ माहिती असलेले ग्रंथालयही चालवले जाते. फाउंडेशन आर्काइव्हल प्रोजेक्ट्स, आर्टस् मॅनेजमेंट प्रोग्राम आणि महत्त्वपूर्ण ललित कला प्रदर्शनांना नियमितपणे प्रोत्साहन दिले जाते.
वांद्रे-वरळी सागरी मार्ग : हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा, पहिला सागरी पूल आहे. हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईतील वरळी येथे जोडतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला ५.६ किलोमीटर लांबीचा हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून, याचे संकल्प चित्र डीएआर कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केले आहे. ह्या पुलाच्या बांधकामासाठी १ ६०० कोटी रुपये इतका खर्च आला असून, ३० जून २००९ रोजी वांद्रे-वरळी सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल मुंबई आणि भारतातील स्टील वायर वापरून केलेला पहिला पूल आहे. या पुलावरील दिव्यांसाठी नऊ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याचे बांधकाम करण्यासाठी ३६ हजार किलोमीटर स्टीलच्या दोऱ्या, पावणे सहा लाख टन सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले आहे. चार हजार कामगार येथे काम करत होते. या पुलामध्ये वापरल्या जाणाऱ्या खास स्टीलच्या तारा चीनकडून घेतल्या गेल्या. या तारांवर विशेष रंगासह, त्या गंजण्यापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादनही देण्यात आले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उत्तर टोकापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुरुवात होते. १९९९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचा पायाभरणी सोहळा पार पडला. असंख्य अडथळे पार करीत १० वर्षांनंतर हा पूल पूर्ण झाला. या पुलामुळे वांद्रा-वरळी हा प्रवास १० ते १५ मिनिटांत पूर्ण होतो. पूर्वी त्यासाठी ५० ते ६० मिनिटे लागायची. तसेच अनेकदा वाहतूककोंडीही व्हायची. हे एक पर्यटन केंद्रही झाले आहे.
वरळी समुद्रकिनारा : सुमारे साडेतीन किलोमीटर लांबी असलेला हा सुंदर किनारा आहे. भरपूर लांबी असल्यामुळे येथे खूप मोकळे जाणवते. येथे वाळूत खेळण्यासाठी जागा नाही. समुद्राच्या लाटा संरक्षक कठड्यावर आपटत असतात. फेरीवाल्यांची गर्दी नसते. येथे कुल्फी छान मिळते. संपूर्ण किनारा बांधलेला आहे. त्याला बांधीव कठडा आणि प्रशस्त चेकर्डने झाकलेला पादचारी मार्ग आहे. बसायला बाके आहेत. संध्याकाळी व सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी भरपूर लोक येथे येत असतात. सागरी पुलावरील विद्युत रोषणाईमुळे याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या लाटा बघण्यासाठी येथे गर्दी होते. सूर्यास्ताच्या वेळी वातावरण खूपच आल्हाददायक असते. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा पुतळा येथे एका बाकावर बसविण्यात आला आहे. त्याच्या शेजारी बसून सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी असतेच. समुद्राच्या समोरच असलेला पांढऱ्या शुभ्र रंगाचा सर जीजीभॉय यांचा टुमदार बंगलादेखील आपले लक्ष वेधून घेतो. पुढे गेलो, की वरळी सी लिंककडे जाणारा मार्ग आहे. तेथे त्यामुळे प्रचंड रहदारी असते. याच परिसरात आरेची ‘वरळी दुग्धशाळा’ असून, हे लहान मुलांच्या सहलीचं ठिकाण आहे.
कसे जाल दादर, वरळी भागात?
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण दादरच्या मध्यवर्ती भागासह वरळीपर्यंतचा भाग पाहिला. आजच्या भागात माहिती घेऊ या दादर पूर्व ते परळ, वडाळ्यापर्यंतच्या पर्यटनस्थळांची.
१०० वर्षांच्या कालखंडानंतर या सगळ्याला दृष्ट लागली आणि १९९०च्या दशकाच्या सुरवातीलाच गिरणी कामगार संप झाला आणि या भागाला ग्रहण लागले. काळ बदलतो, वेगळ्या दिशा सापडतात; पण मनावर झालेली खोल जखम कशी भरून निघणार? मी माझ्या मित्राकडे डिलाइल रोडवरील हरहरवाला बिल्डिंगमध्ये जायचो. एका खोलीत २५ ते ३० जण राहायचे. रात्रपाळीचे दिवसा झोपायचे, दिवस पाळीचे रात्री, असे त्यांचे जीवन होते. काळ बदलला. माझा मित्र आता नाही; पण त्याचा मुलगा आयटी क्षेत्रात आहे. नोकरीसाठी जर्मनीत गेला. काळाप्रमाणे बदल होतो आहे. परळ हा मध्यमवर्गीय चाळींची वसाहत असलेला भाग होता. आता त्याचे रूप बदलून जुन्या चाळवजा इमारती पाडून तेथे आता टॉवर उभे राहू लागले आहेत.
हाफकिन इन्स्टिट्यूट : वॉल्डेमार मॉर्डिकाय वुल्फ हाफकिन या रशियन शास्त्रज्ञाने १८ जुलै १८९२ रोजी पटकी (कॉलरा) या रोगाची प्रतिबंधक लस तयार केली. हाफकिन यांनी कॉलरा प्लेगच्या लसीचा अगोदर स्वतःवर प्रयोग केला होता. या लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी ते फ्रान्सहून मार्च १८९३मध्ये पटकीची साथ सुरू असलेल्या कोलकाता येथे आले. त्यांच्या लशीचा उपयोग जवळपास ४० हजार रुग्णांना झाला. त्यांच्या या कामगिरीमुळे १८९६मध्ये मुंबईत उद्भवलेल्या प्लेगच्या साथीवर लस शोधण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना बोलावले. सुरुवातीला त्यांनी आपले संशोधन ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एक खोली असलेल्या लहान प्रयोगशाळेत सुरू केले. अल्पावधीतच (तीन महिन्यांत) त्यांना लस तयार करण्यात यश मिळाले. नंतर त्यांना कामासाठी प्रयोगशाळा अपुरी पडू लागली. त्यामुळे विविध जागांत स्थलांतर करीत शेवटी १० ऑगस्ट १८९९ रोजी ‘गव्हर्न्मेंट हाउस’ या इमारतीत हाफकिन यांची ‘प्लेग रिसर्च लॅबोरेटरी’ स्थिरावली. १९०६मध्ये या प्रयोगशाळेचे नाव बदलून ‘बॉम्बे बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ असे ठेवण्यात आले. हाफकिन यांच्या सेवानिवृत्तीनंतर १० वर्षांनी म्हणजे १९२५मध्ये त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या प्रयोगशाळेचे नाव ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ असे करण्यात आले.
शिवडी किल्ला : मुंबईचा पश्चिम किनारा हा मुंबईकरांना व पर्यटकांचा जास्त माहिती असतो. मुंबईचा पूर्व किनारा मात्र दुलक्षित आहे. पर्यटन विभागच्या प्रयत्नातून आता पूर्व किनाऱ्यावरील ठिकाणे उजेडात येत आहेत. शिवडी हा किल्ला ब्रिटिशांनी मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर सन १६८०मध्ये बांधला. मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होत होता. या किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. जवळील खारफुटी वनामध्ये येणारे फ्लेमिंगो आकर्षण ठरत आहेत. पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटिशांना दिल्यावर ब्रिटिशांनी सुरतहून मुंबईत तळ हलवण्याची योजना आखली. आफ्रिकन वंशाच्या सिद्दींनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले. सिद्दींनीदेखील इंग्रजांना शत्रू म्हणून घोषित केले. सन १६७२मध्ये सिद्दींनी केलेल्या हल्ल्यांचा सामना करत मुंबईत अनेक किल्ले बांधण्यात आले त्यातच हा किल्ला पूर्व किनाऱ्यावरील सिद्दीच्या आक्रमणामुळे महत्त्वाचा होता. तोफांसह येथे लष्कर सिद्ध असायचे. यात ५० शिपायांची एक चौकी होती आणि सुभेदार देखभाल करायचे. त्यात आठ ते दहा तोफासुद्धा होत्या. किल्ल्यावर आता कोणतीही बांधकामे शिल्लक नाहीत. आता किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामाची दुरुस्ती व बगीचा, तसेच सांग्रहालय करण्याचे काम प्रस्तावित आहे. येथे पक्षी निरीक्षणाची सोय करण्यात येणार आहे.
शिवडी मॅन्ग्रूव्ह पार्क : १५ जानेवारी १९९६ रोजी बॉम्बे पोर्ट ट्रस्टने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. शिवडी आणी ट्रॉम्बेदरम्यान दलदलीमध्ये १५ एकर खारफुटी असून, त्या वनाचा समावेश या उद्यानात आहे. मध्यंतरी बरीच वर्षे येथे पक्षी येणे बंद झाले होते. किंगफिशर, गुल्स (काळे डोके असलेले आणि तपकिरी डोळे असलेले), तसेच ब्लॅक-टेल गोडविट्स आणि कॉमन सँडपीपर्स, लिटल एस्प्रेट्स इत्यादी पक्षी पाण्यातून विहार करताना आढळतात. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शिवडी (सेवरी) स्थानकातून येथे पोहोचता येते.
परळ भागातील उद्याने : शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, लाल मैदान, भिवजीभाई नारे उद्यान, शहीद भगतसिंग मैदान
के. ई. एम. हॉस्पिटल : आचार्य दोंदे मार्गावर १९२६मध्ये स्थापन झालेले सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (जीएसएमसी) आणि किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल या भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था आहेत. वैद्यकीय महाविद्यालय (शाळा) सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देते; पदवी आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपीमध्ये, विविध मास्टर्स आणि पीएचडी कोर्स आणि एक नर्सिंग स्कूलसुद्धा येथे चालविले जाते. येथे ५५० डॉक्टर्स, ४०० कर्मचारी, १८०० कॉट्स असून रुग्णांना अत्याधुनिक सेवा पुरविली जाते. दर वर्षी सुमारे १.८ लाख रुग्णांवर येथे उपचार केले जातात.
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईतील ब्रीच कँडी, महालक्ष्मी परिसर पाहिला. या भागात पाहू या भायखळा परिसरातील ठिकाणे. त्यात राणीची बाग, भाऊ दाजी लाड संग्रहालय, रॉयल ऑपेरा हाउस अशा स्थळांचा समावेश आहे.
प्राणिसंग्रहालयात सुमारे १८० सस्तन प्राणी, ५०० पक्षी आणि ४० सरपटणारे प्राणी आहेत. हत्ती, घोडे, वाघ, सिंह, विविध प्रकारची हरणे, माकडे, मोर, पाणघोडे, अस्वल, कोल्हे, मगरी अशी अनेक जंगली श्वापदे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे लहान मुलांना आनंद मिळतो. ४८ एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात सुमारे तीन हजार प्रजातीची दुर्मीळ झाडे आहेत. जिजामाता उद्यानातील पेंग्विन हेही आता मोठे आकर्षण आहे. आयात केलेल्या पेंग्विनसाठी खास बर्फाळ वातावरण कृत्रिमरीत्या तयार करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पहिला पेंग्विन येथे जन्माला आला.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय : राणीच्या बाग परिसरातच असलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय पर्यटकांकडून दुर्लक्षित होते. आवर्जून बघावे असे हे संग्रहालय आहे. राणीची बाग होण्यापूर्वीपासून हे संग्रहालय आहे. सन १८५५मध्ये भाऊ दाजींच्या प्रयत्नातून हे संग्रहालय सुरू झाले.
सुरेख मांडणी हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. येथे प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम, मातीची भांडी (टेराकोटा) पाहायला मिळतात. याच दालनाच्या मध्यभागी माउंट स्टुअर्ट एलफिस्टन (मुंबईचा गव्हर्नर १८१९-१८२७), प्रिन्स अल्बर्ट, क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी १८३७-१९०२) आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. मुंबईच्या अनेक भागांत असलेले ब्रिटिशकालीन पुतळे येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये लॉर्ड हार्डिंग्स (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण - अपोलो बंदर, मुंबई), एडविन एस. मॉन्टाग्यू (मॅजेस्टी प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया; मूळ ठिकाण - मरीन लाइन्स मैदान), डॉ. थॉमस ब्लाने (पब्लिक सर्व्हिस; मूळ ठिकाण - फोर्ट), सर रिचर्ड टेम्पल बॅरोनेट (गव्हर्नर ऑफ बॉम्बे; मूळ ठिकाण - एस्प्लेनेड, मुंबई), लॉर्ड मक्यूस ऑफ व्हॅलेस्टी (गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया; मूळ ठिकाण - फोर्ट, मुंबई), लॉर्ड सँडहर्स्ट (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी; मूळ ठिकाण - फोर्ट.) हे सर्व पुतळे संग्रहालयाबाहेर ठेवण्यात आले आहेत.
जेकब सर्कल : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये महालक्ष्मी स्थानकाच्या पूर्वेला हा गजबजलेला चौक आहे. या ठिकाणाला संत गाडगे महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. तसेच सात रस्ता चौक म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. मध्यभागी छोटे उद्यानही करण्यात आले आहे. शाळा, बस स्टॉप, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स, बँका, एटीएम आणि इतर महत्त्वाच्या बाबी येथे आहेत. येथे मोनोरेल स्टेशन आहे.
मराठा मंदिर : मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ हे चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट सलग १९ वर्षे सुरू होता व हा एक जागतिक विक्रम झाला. येथे अनेक चित्रपट दीर्घ काळ चालले. रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळ असल्यामुळे सामान्य माणसाला येथे येणे सोपे पडते.
रॉयल ऑपेरा हाउस : गिरणी चौपाटीजवळ हे वारसा ठिकाणच्या यादीत असलेले चित्रपटगृह आहे. या भागाला ऑपेरा हाउस असे नाव पडले. ही देखणी इमारत युरोपीयन आणि भारतीय वास्तुशास्त्रीय शैलींचे मिश्रण आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत १९११मध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी या इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यानंतर येथे नाटक, संगीत मैफली होऊ लागल्या. कालांतराने येथे हिंदी चित्रपटही प्रदर्शित होऊ लागले. १९८०च्या दशकात घरातील व्हिडिओ प्लेयर लोकप्रिय होऊ लागले, तसतसे मुंबईतील सिनेमाघरांचे नुकसान होऊ लागले. त्यापाठोपाठ दूरदर्शनही सुरू झाले आणि सन १९९३मध्ये हे चांगले थिएटरही बंद करावे लागले. वारसा वास्तू असल्याने याच्या विकसनालाही परवानगी मिळत नव्हती. अखेर २००८मध्ये बाहेरील भागाचे नूतनीकरण सुरू झाले व २०१६मध्ये ते पूर्ण झाले. २३ वर्षांनी ऑपेरा हाउसचे मालक महाराजा जयेंद्रसिंहजी जडेजा आणि गुजरातच्या गोंडलच्या महाराणी कुमुद कुमारी जडेजा यांनी सोप्रानो पेट्रीसिया रोजारियो आणि तिचा नवरा पियानोवादक मार्क ट्रूप यांचा खासगी कार्यक्रम येथे आयोजित केला होता. (रॉयल ऑपेरा हाउसबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कसे जाल भायखळा परिसरात?
मुंबई - घारापुरी - नेहरू सायन्स पार्क
भल्या पहाटे 5 ला उठून सर्व आवरले. नेटवरून बुकिंग केलेली ऑनलाईन रेल्वे तिकीटे घेतल्याची खात्री केली. सामानाची आवाराअवर करून चिंचवडला 6.35 ची सिंहगड एक्सप्रेस पकडण्यास निघालो. वेटिंग लिस्टवर नाव होते. रविवार आणि सोमवारी संक्रांत आल्याने गाडीला चांगलीच गर्दी होती. गाडीत सतत वावरणारे चाय, कटलेट, वडापाव विकणा:यांचा साहजिकच गर्दीतील उभ्या असणा:यांना प्रवाशांना त्रस होत होता. एका बाईने तर परत एकडे याला तर खाली फेकून देईल, अशी धमकीच या विक्रेत्यांना दिली. आमचेही पोट असते. म्हटल्यावर गर्दीतील गडबड गोंधळ जरा कमी झाला. कल्याण आल्यावर बसायला जागा मिळाली. एकूण 2 तास मजेत गेले. छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला बरोबर 10 ला गाडी पोचली. येथे 26/11 नंतर येथे चांगला बंदोबस्त केलेला आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) :
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ही वास्तू सध्या मध्य रेल्वेची मुख्यालय म्हणून परिचित असून मुंबईतील नाही तर भारतातील सर्वात महत्त्वाचे असे ते रेल्वे स्थानक आहे. येथून दिल्ली, कोलकाता, चेन्नई, कोकण, पुणो यासारख्या ठिकाणी रेल्वे जातात. या वास्तूचा निर्मिती-आराखडा फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन्स यांनी 1887-88 या काळात निर्माण केला. कामाला सुरु वात 1889 ला होऊन ते 1897ला पूर्ण झाले. या वास्तूवर कोरीव काम केलेले आहे. वेगवेगळे प्राणी देखील कोरलेले आहे. 1996 ला या इमारतीचे व्हिक्टोरीया टर्मिनस हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘रावण’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्यात सीएसटीची इमारत फोडून ट्रेन बाहेर येते असे कॉम्प्युटरद्वारे चित्रीत केले आहे. स्टेशनच्या बाहेर येऊन गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारी टॅक्सी पकडली. 25 रुपयांत गेटवे ऑफ इंडिया आले. जरा वेळ फोटोग्राफी करून 10.30 ला घारापुरीकडे जाणारी लाँचचे तिकीट काढले.
घारापुरी :
घारापुरीला पोहोचण्यासाठी आपल्याला गेट वे ऑफ इंडियाहून लॉँच पकडावी लागते. यात पब्लिक लाँच व लक्झरी लाँच असे दोन पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आम्ही मात्र, पब्लिक लाँचचे 150 रुपये माणसी तिकीट काढले. 20 रुपये जादा देऊन बोटीच्या वरच्या मजल्यावर समुद्राचा नजरा पाहण्यासाठी गेलो.
गेटवे ते घारापुरी बेटापर्यंतच्या एका तासाच्या लाँच प्रवासात मोठमोठी मालवाहू जहाजे दिसतात. समुद्री पक्षी या जहाजांच्या शेजारी घिरटय़ा घालताना किंवा समुद्रात मासे पकडताना दिसतात. समुद्रातून जाताना एक लांबलचक पाइपलाइनही दिसते. ती तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये वाहून नेणा:या तेलाची पाईप लाईन असल्याचे लाँचवरील चालकाने सांगितले. समुदाचा खारा वारा अंगावर घेत, आजुबाजूची छोटी जहाजे व मोठी जहाजे पाहत तासाभरातच घारापुरी आली. 1534 मध्ये घारापुरी बेट पोतरुगिजांनी ताब्यात घेतले. पुढे शिवाजीमहाराजांच्या काळात मराठय़ांनी ते जिंकले. त्यानंतर इ.स. 1774 मध्ये घारापुरी बेट इंग्रजी सत्तेच्या हाती जाऊन 1947 पर्यंत ते त्यांच्या सत्तेखालीच होते.
घारापुरीच्या समोरच तुर्भे येथील अणुभट्टीचा गोल घुमट दिसतो. घारापुरी बेट हे एखाद्या उंच टेकडीसारखे आहे. घारापुरीच्या नवीन जेट्टीवर (प्रवाशांना उतरण्यासाठी समुद्रात तयार केलेला छोटासा पूल) उतरलो. येथून घारापुरीचा डोंगर 2 किलोमीटरवर आहे. हे अंतर चालत जाण्याएवढे असले तरी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून येथे प्रवाशांना नेण्यासाठी छोटय़ा रेल्वेची घारापुरी ग्रामपंचायतीने सोय केली आहे. केवळ 1क् रुपयांत र्टिन तिकीट आपणाला मिळते. वाटेत आवळे, बोरं, काकडी, कै:या असा रानाचा मेवा विक्रीसाठी उपलब्ध होता. दुपारचे 12 वाजले होते. प्रथम पोटोबा करून लेण्या पाहण्यासाठी निघालो. लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 120 ते 125 पाय:या चढाव्या लागतात. या पाय:यांच्या दोन्ही बाजुला अनेक हस्तकलेच्या वस्तू, दगडात कोरीव काम केलेले हत्ती, जुन्या काळी वापरत असलेल्या वस्तू, मोत्यांच्या माळा, महिलांसाठी पसेर्स विकायला ठेवलेल्या होत्या. या वस्तू बहुधा मुंबईतच तयार केलेल्या असणार कारण मुंबईत इतरत्र फिरल्यावर या वस्तू नक्कीच दिसतात. दगडातील कोरीव काम केलेल्या वस्तूंच्या किंमती विचारून आपल्याला धक्काच बसतो. विदेशी पर्यटकांची मात्र, येथे चांगलीच लुबडणूक होते. टेकडीवर पोहचण्यास सुमारे अर्धा तास पुरतो. लेणीपर्यंत जाणारी चढण फार मोठी नाही; पण वृद्ध अथवा अपंगांना पायथ्यापासून डोली-खुर्चीची सोय आहे. (अर्थातच पैसे देऊन) काही कालावधीसाठी राहण्यासाठी येथे राज्य पर्यटन खात्याची निवास व्यवस्था आहे. त्याचप्रमाणो खाण्यापिण्यासाठी सरकारी हॉटेल्स तर काही छोटी खासगी हॉटेल्स आहेत! एक पिकनिक स्पॉट म्हणून घारापुरीला आता ओळखले जाते. खरे तर जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्या पाहून त्यांचा अभ्यास करायला हवा. मात्र, गंमत म्हणून येथील कोरीव काम केलेल्या मूर्तीबरोबर आपला स्वत:चा व मित्रमैत्रिणींचा फोटो काढणारे जास्त अशी परिस्थिती सध्या सर्वच लेण्यांमध्ये दिसून येते. लेणी पाहण्यासाठी आलेल्यांची पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. लेणी पाहायला आलेल्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या खूपच असते. घारापुरीचे प्राचीनकाळी ‘श्रीहरी’ असे नाव होते. या बेटावर शैव संप्रदायाच्या लेण्या आहेत. मुंबईपासून 10 ते 12 कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर या लेण्या आहेत. इ.स. 3 ते इ.स. 7 या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते. पूर्वी या बेटाच्या दक्षिणोला एक मोठा दगडी हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. त्या हत्तीवरूनच या लेणींना ‘एलिफंटा केव्हज’ हे नाव मिळाले. हा हत्ती सध्या मुंबईतीलच जिजामाता उद्यान (जुने नाव राणीची बाग) येथे आहे. या लेणींचादेखील ‘जागतिक वारसा’ च्या यादीमध्ये समावेश झाला आहे. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मुस्लिम व पोर्तुगीज साम्राज्याच्या ताब्यात हे बेट होते. भौगोलिकदृष्टया रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हा परिसर येतो. अजंठा, वेरूळ, कार्ला, भाजे सारख्याच येथेही गुफा आहेत. जुन्या काळच्या ध्यानधारणा करण्यासाठी खोल्या आहेत. एकूण पाच गुंफा आहेत. कोरीव काम फारच छान आहे. काही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. काहींचे हात, पाय, चेहरा विद्रुप केलेला आहे.
लेण्या :
सहाव्या शतकात काळय़ा पाषाणात कोरलेल्या या लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांना
वल्र्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे. शिवशंकराची अनेक रुपे या या
लेण्यांमध्ये साकारली आहेत. महाराष्ट्रात वेरु ळ, जोगेश्वरी, अंबेजोगाई या
ठिकाणी शैव लेण्या आहेत. येथील गाभा:याच्या मंडपात मोठय़ा आकाराचे शिविलंग
असून चारही दिशेला प्रवेशद्वार आहे.
पहिली गुफा सर्वात मोठी आहे. लेण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे भव्य अशी
महेशमूर्ती (सदाशिव) त्रिमूर्ती. ब्रम्हा, विष्णू आणि महेश (शिवशंकर)
यांच्या मूर्तीने जगभरातील पर्यटकांना मोहित केले आहे. महाराष्ट्र पर्यटन
महामंडळाच्या बोधचिन्हासाठी त्याचा वापर केला गेला आहे. छातीपासूनची ही
शिवाची मूर्ती भव्य आणि उंच असून त्यातून उत्पत्ती - स्थिती आणि लय ही
शंकराची तीन रूपं दाखविली आहेत. लेण्यातील महामंडप 130 फूट लांबी- रुंदीचा
आणि 17 फूट उंचीचा आहे. सभामंडपाचं छत 26 खांबांवर आधारलेले आहे. प्रत्येक
शिल्प पौराणिक कथा पार्श्वभूमी असून शिल्पकारांनी त्याला वास्तव रूप आहे.
या मूर्तीच्या डावीकडे गंगावतरण शिल्प आहे. भगीरथ गंगा पृथ्वीवर आणली तो
प्रसंग 5 मी. उंचीच्या शिल्पातून साकारला आहे. शिवपार्वती विवाह सोहळय़ाचा
प्रसंग दाखिवणारे शिल्प आहे. या शिल्पाच्या शेजारीच अंधकारसुरवधमूर्ती
शिल्प आहे. शिवाच्या तांडव नृत्याचे शिल्पही आहे. प्राचीन भव्य शिविलंग,
डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य सान्निध्यातील सीतागुंफा हेदेखील आवर्जून
पाहण्यासारखे आहे.
गुंफा क्र . 2, 3, 4 त्या मानाने लहान आहेत. पाचव्या गुफेत फार पडझड झालेली
दिसली. उन, वारा, पावसामुळे गुफेत माती भरली गेली आहे. शेवटच्या दोन्ही
लेणींमध्ये आतमध्ये कोणतेही कोरीव काम नाही. या लेण्यात खूप मोठय़ा
प्रमाणावर मातीचा ढिगारा दिसला. या ठिकाणी मात्र, महाराष्ट्र पुरातत्व
विभागाचे दुर्लक्ष आहे. सिंहाची आयाळ, घोडय़ाचे शरीर, वरती शिंगे असे
त्याचे रूप आहे. हे सहाव्या शतकातील लेणो आहे. त्यानंतरचे तीन क्र मांकाचे
लेणो हे खोदलेले व चांगल्या स्थितीत आहे. तर दोन क्रमांकाचे लेणो हे मात्र
अर्धवट सोडण्यात आले आहे. शिवपार्वती विवाह शिल्पकृती, चतुर्भुज
द्वारपाल, गणोशमूर्ती, अर्धनारीनटेश्र्वराची कार्तिकेय ही शिल्पदेखील
आहेत. ‘साइट म्युझयिम’ लेण्यांच्या परिसरातच आहे. मुंबईच्या परिसराचा आणि
महाराष्ट्रातील अन्य लेण्यांचा इतिहासही येथील भिंतींवर पाहण्यास मिळतो.
सर्व लेणी पहायला साधारणपणो तीन तास लागतात.
लेण्या पाहून पुन्हा जेट्टीवरील कोणत्याही सोडण्यात येणा:या लाँचमधून पुन्हा गेटवे ला आलो. तेथून चालत चर्चगेट स्टेशनपर्यंत निघालो. वाटेत मुंबई विद्यापीठाची इमारत दिसली. शेजारीच राजाभाई टॉवरही सुरेख आहे. तेथे दोन-चार फोटो काढून चर्चगेटच्या बाहेरील मार्केटही पाहिले. रविवार असल्याने ट्रेनला गर्दी कमी होती.
संध्याकाळी 7 ला आत्याच्या घरी मुक्कामाला गेलो. दुस:या दिवशी आत्याचा पाहुणचार घेऊन दुस:या दिवशी सकाळी 10 ला घर सोडले. ते महालक्ष्मी येथील नेहरू सायन्स सेंटर पाहण्यासाठी. फास्ट लोकल व स्लो लोकल कुठल्या स्टेशनवर थांबते याचा अंदाज आला नाही. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशनवर गाडी थांबली नाही. सहप्रवाशांनी मग बॉम्बे सेंट्रलला उतरून परत मागे येणारी लोकल पकडा अथवा टॅक्स करून नेहरू सायन्स सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. मग ट्रेन न पकडता बॉम्बे सेंट्रलमधून बाहेर येऊन टॅक्सी केली. 58 रुपयांमध्ये महालक्ष्मीमधील नेहरू सायन्स सेंटरला टॅक्सीने सोडले. 11 वाजता 25 रुपये माणसी तिकीट काढून नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रवेश केला.
नेहरू सायन्स सेंटर :
इलेक्ट्रॉनिक्स,
इलेक्ट्रीकल म्हणजे काय?, भूकंप कसे होतात?, शॉक कसा बसतो, पृथ्वी गोल आहे
काय? सूर्यमाला कशी आहे? ती कशी फिरते? अॅम्पिअर, व्होल्ट काय आहे? वेग,
अंतर, दाब कसं मोजतात? आपल्याला दिसतं कसं? प्रकाशाचा वेग काय आणि कसा
असतो? अशा प्रश्नांची उत्तरं देणारं शास्त्न म्हणजे विज्ञान आणि या
विज्ञानाची प्रात्यक्षिके स्वत: करायला मिळणो म्हणजे आनंदच. येथे
विज्ञानाची गंमत-जंमत अनुभवण्यासाठी विविध प्रकारचे एकूण 11 मोठी दालने
आहेत. त्यातील प्रत्येक दालतना विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करायला मिळतात.
लहान मुलांचं कुतूहल किंवा चौकस बुद्धी मोठी असते. ती अजून वाढवावी यासाठी
या सायन्स सेंटरची निर्मिती केली आहे. लहान असताना एकदा येथे गेलो होतो.
आज बरेच वर्षानी नेहरू सायन्स सेंटरला हे सर्व पाहण्यासाठी गेलो.
सकाळी 11.15 ला येथे पोचलो. वाटतेच सी सॉ, झोपाळा असलेलं गार्डन आहे. ही
विज्ञानाची बाग आहे ही. तिथून थोडंसं पुढे गेलो तर पूर्वीच्या काळी
इलेक्तिट्रक इंजिन, वाफेचं इंजिन, स्टीम लॉरी, घोडय़ांची ट्रामगाडी,
इलेक्ट्रिक ट्राम, लढाऊ विमान ठेवलेले दिसले. मुख्य इमारतीकडे जाण्यापूर्वी
विज्ञान क्षेत्रत मोठी कामगिरी केलेले जगदीशचंद्र बोस, श्रीनिवास
रामानुजन, चंद्रशेखर वेंकटरमण, सत्यंद्रनाथ बोस, होमी जहांगीर भाभा अशा
काही शास्त्रज्ञांची अर्ध पुतळे उभारले आहेत.
‘विज्ञान ओडिसी’ नावाची एक नवीन रंगीत इमारत दिसली. येथे थ्रीडी सिनेमा
पाहायला मिळतात. मात्र, त्याचे वेगळे तिकीट काढायला लागते. ते येथेच उपलब्ध
असते.
एक टाचणी तळहाताला जोरात टोचली तर टोचते. मात्र, अनेक टाचण्या घेऊन त्या
एकत्रितरित्या टोचल्या तर त्या टोचत नाहीत. या संबंधी टाचणाचा येथे प्रयोग
आहे. मजा म्हणजे या टाचण्यांना आपण स्वत: हात लावून पाहू शकतो.
‘लाइट
अँड साइट’ हे असेच एक दालन कोणतीही वस्तू आपल्या डोळय़ांना कशी दिसते?
प्रकाश व रंगाचा संबंध काय? विविध रंग कसे दिसतात? ध्वनीचा आपल्या मेंदूवर
कसा परिणाम होतो किंवा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो? हे ‘साऊंड अँड
हिअरिंग’ दालनात पाहायला मिळाले. स्पर्शाचं, वासाचं, चवीचं ज्ञान कसं होतं,
जिभेवर कुठल्या ठिकाणी कुठल्या चवीचे ज्ञान होते. याचे बटण दाबून मोठय़ा
जिभेच्या प्रतिकृतीवर लाईटींग होऊन आपल्याला पाहायला मिळते. याविषयीची
मानवी शरीराच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहितीही या ठिकाणी मिळेल.
‘सायन्स फॉर चिल्ड्रन’ या गॅलरीत साबणाचे बुडबुडय़ांसारखे काही मजेशीर
प्रयोग करून छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतून विज्ञान कळत जाईल.
अवर टेक्नॉलॉजी हेरिटेज.’ त्यात शून्याचा शोध कसा लागला? पायथागोरस
सिद्धान्त, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसे? पूर्वीच्या मूळ गणिताविषयी, तसेच अन्य
मानवी संबंधाविषयी या ठिकाणी माहिती आहे. संगणकाचा शोध कसा लागला.
टायपराईटरचा शोध, ‘प्रिहिस्टॉरिक अॅनिमल लाइफ’ यात प्रागेएतिहासिक काळातील
डायनोसर व बुली मॅमथ (हत्ती) पाहून मोठे आश्चर्य वाटते. या दालनात या
प्राण्यांचे आवाज येत असतात.
वेळ कमी असल्याने भराभरा पाहता येतील तेवढी विज्ञानावर आधारित प्रयोग पाहत गेलो.
- येथे जाण्यासाठी महालक्ष्मी स्टेशनवर 10 मिनिटात टॅक्सीने जाता येते. टॅक्सीभाडे 15 रुपये पडते.
- येथून जवळच महालक्ष्मीचे मंदिरही आहे.
- नेहरू सायन्स सेंटर हे वर्षातील सर्व दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत उघडे असते. फक्त होळीच्या दुस:या दिवशी आणि दिवाळीत काही दिवस बंद असते.
- तिकीट दर : 25 रुपये प्रत्येकी
- http://www.nehrusciencecentre.org















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.