Friday, November 27, 2020

नयनरम्य बाली

 भाग 1 - तोंडओळख आणि सहलीची सुरुवात

 बाली – इंडोनेशिया या अगणित बेटांच्या देशातील एक लहानसे नयनरम्य बेट. तसं बाली पर्यटनाच्या नकाशावर जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे फारशी ओळख करून द्यायची गरज नाही. पण उपचारापुरती या बेटाची काही वैशिष्ट्ये सांगतो. बेट असल्याने इथे सुंदर समुद्रकिनारे तर आहेतच, पण मध्यवर्ती भागात एक नव्हे तर तीन ज्वालामुखी आहेत. यांपैकी अगुंग आणि बतूर सक्रीय आहेत. बालीच्या आजूबाजूचा समुद्र हा सागरी जैव विविधतेने युक्त असून इथे अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हिंदू परंपरा आणि चालीरीतींचा प्रभाव असलेला इथला समाज. बालीमध्ये पर्यटनाला साधारण १९६० च्या दशकात सुरुवात झाली. अल्पावधीतच हे लहानसे बेट आशिया खंडातले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले. सागरी क्रीडाप्रकार, ट्रेकिंग, किनाराभ्रमंती, पार्टिंग आणि नाईटलाईफ, किंवा अगदी कौटुंबिक सहल, असा कोणताही पर्यटन प्रकार बालीसाठी त्याज्य नाही. मग तुम्ही बॅकपॅकर असा किंवा हनिमूनर, बालीमध्ये तुमच्यासाठी काही ना काही आहेच. तर असे हे वैशिष्ट्यपूर्ण बेट माझ्या बकेटलिस्ट वर बऱ्याच वर्षांपासून होते. दक्षिण गोलार्धात असल्याने बालीमध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा पावसाळा असतो. त्यामानाने मे ते सप्टेंबर वातावरण सौम्य आणि आल्हाददायक असते. त्यात जुलै आणि ऑगस्ट म्हणजे इथला पीक सिझन. या महिन्यांत युरोप मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने तिथल्या पर्यटकांचा मोठा ओघ असतो. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये थंडीचे दिवस असल्याने तिथूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारा पर्यटनासाठी येतात. त्यातल्या त्यात कमी गर्दीचा आणि कमी उन्हा-पावसाचा म्हणून मी जून महिना तिथे जायला निवडला. एयर एशिया त्रिचीवरून अगदीच स्वस्तात तिकिटे देत होती. म्हणजे, बंगलोर वरून जेवढे तिकीट होते त्याच्या अक्षरशः निम्म्या किमतीत त्रिचीहून तिकीट मिळत होते.  झटक्यात तिकीटं काढली आणि सहलीच्या दिवसाची वाट बघू लागलो.

एका दृष्टिक्षेपात बाली

त्रिचीवरुन सकाळी साडे नऊचे विमान होते. आदल्या दिवशी बंगलोरहून स्लीपर बसमध्ये बसलो. वेळापत्रकानुसार सकाळी सहा वाजता त्रिचीला पोहोचणे अपेक्षित होते. पण साडेसहा वाजत आले तरी बस अजून नमक्कललाही पोहोचली नव्हती. आता मात्र माझा जीव खालीवर होऊ लागला. विमान चुकते की काय अशी भीती वाटू लागली. एकदाची पावणे आठ वाजता बस त्रिचीला पोहोचली. मी लगबगीत खाली उतरलो आणि समोर दिसली त्या रिक्षात बसलो. चालकाला म्हटलं शक्य तितक्या लवकर विमानतळावर पोहोचव. नशिबाने त्रिचीचा विमानतळ शहराच्या जवळच होता. दहा मिनिटातच तिथे पोहोचलो. एकदाचं चेक इन केलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. यथावकाश विमानाने उड्डाण केलं. थोडी उंची गाठताच कावेरीचं विशाल पात्रं, आजूबाजूची भातशेती, आणि श्रीरंगमच्या प्राचीन मंदिराची उत्तुंग गोपुरं दिसू लागली. या सगळ्या प्रदेशाला rice bowl of India असे म्हणतात. हा तोच प्रदेश जिथे चोळ राजांनी कित्येक शतके राज्य केले. तंजावर आणि श्रीरंगम सारखी मंदिरे बांधली. कावेरीच्या खोर्‍याचे विहंगम दृश्य पाहताना तिथला इतिहास डोळ्यांसमोर तरळत होता.    

त्रिची ते क्वालालांपूर आणि तिथून बाली असा एकूण 13 तासांचा प्रवास होता. विमानप्रवास म्हणजे एक दिव्यच असतं. त्यात एखाद्या ठिकाणी लांब ले-ओवर असेल तर अजूनच कंटाळा येतो. एकदाचा स्थानिक वेळेनुसार रात्री एक वाजता मी बालीच्या देनपसार विमानतळावर उतरलो. इमिग्रेशनला ही भली मोठी रांग. आधीच एवढा मोठा प्रवास. त्यात आदल्या रात्रीची बसमधली अपुरी झोप. कधी एकदा हॉस्टेल वर जाऊन अंग टेकतोय असं झालं होतं. तेवढ्यात काही मराठी शब्द कानावर पडले. पाहतो तर एक वयस्क जोडपं मागेच उभं होतं. काका-काकू मुंबईचेच होते. आठ दिवसांच्या बाली ट्रीपला आले होते. मग त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. म्हणता म्हणता दोन  तासांची ती इमिग्रेशनची रांग संपली. काका-काकूंना बाय बाय करून मी विमानतळाच्या बाहेर पडलो. हॉस्टेल जवळच होतं. त्या परिसरचा ऑफलाइन नकाशा मी आधीच डाउनलोड करून ठेवला होता. बस किंवा टॅक्सी काही न बघता मी सरळ चालत सुटलो. परक्या देशात निर्जन रस्त्यावरून रात्री तीन वाजता चालताना जरा धाकधूक वाटत होती खरी. पण एवढ्याशा अंतरासाठी उगीच कशाला खर्च करा? मनाचा ठिय्या करून मी नकाशा बघत बघत चालू लागलो. वीसेक मिनिटातच हॉस्टेलची पाटी दिसली. चेक इन केलं आणि सरळ बेडवर आडवा झालो.  

सकाळी जाग आली तेव्हा साडेदहा वाजले होते. हॉस्टेलमधली ब्रेकफास्टची वेळ कधीच संपली होती. मग बाहेर पडलो आसपासचा परिसर बघायला. समुद्रकिनारा अक्षरशः ढेंगभर अंतरावर होता. काल रात्री सामसूम वाटलेला हा परिसर आता मात्र पर्यटकांनी फुलून गेला होता. मी एका लहानशा उपहारगृहात ब्रेकफास्ट केला, लोकल सिम कार्ड घेतले, आणि हॉस्टेलवर परतलो. बालीमध्ये फिरायला एक स्कूटर मी आधीच बुक करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे स्कूटरवाला हॉस्टेलवर हजर झाला. सगळी औपचारिकता पूर्ण करून मी स्कूटरचा ताबा घेतला. पाच मिनिटं शांतपणे बसून आज कुठे कुठे जायचे आहे त्याची एक रूपरेषा बनवली. मग सगळी तयारी करून हेलमेट चढवले आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत स्कूटर चालू केली.            

क्रमशः

 भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क

 

माझं हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे, गरुडा-विष्णु-कांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच. स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला प्लॅस्टिकचे कवरही होते. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते. अर्ध्या तासातच जिंबरान बीच वर पोहोचलो. दक्षिण बालीमधला हा एक महत्वाचा बीच. प्रशस्त अर्धवर्तुळाकृती किनारा, एकापुढे एक उपहारगृहे आणि त्यांचा आडव्या खुर्च्या, त्यावर बसून खान-पानाचा आनंद घेणारे पर्यटक, आणि समोर पसरलेला विशाल निळा-हिरवा समुद्र. इतकं स्वछ पाणी युरोपनंतर इथेच बघत होतो. लाटा बेभान उसळत होत्या. भरतीची वेळ असावी. दूरवर लहान-मोठ्या टेकड्या दिसत होत्या. एका टेकडीवर गरुडावर स्वार झालेली विष्णूची मूर्ती दिसत होती. ही मूर्ती नुकत्याच बांधलेल्या गरुडा-विष्णु-कांचना पार्कमधली होती. आज बघायच्या ठरवलेल्या जागांमध्ये हे पार्क होतेच. इथून दिसत असलेली ती सुंदर मूर्ती बघून माझी पार्क बद्दलची उत्सुकता अजूनच ताणली गेली. जिंबरानची भेट आटोपती घेत मी गरुडा-विष्णु-कांचना पार्ककडे निघालो.

जिंबरानचा समुद्रकिनारा आणि दूरवर दिसणारी विष्णूची मूर्ती

विष्णूची पूजेत असलेली अर्धमूर्ती

हे पार्क एका टेकडीवर असल्याने रस्ता तसा चढणीचा होता. एक मोठे वळण घेतले आणि पार्कच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरलो. प्रशस्त पार्किंगची जागा, रुंद रस्ते, आजूबाजूला फुलवलेल्या बागा, असा रम्य परिसर होता. दुपारची उन्हाची वेळ होती. तरीही उष्मा फारसा जाणवत नव्हता. तिकीट जरा महागडेच होते. त्यासोबत एक सारोंग देण्यात आले होते. सारोंग म्हणजे इथली लुंगी. कोणत्याही देवळात जाताना इथे कमरेभोवती वस्त्र गुंडाळायची पद्धत आहे. त्यालाच सारोंग म्हणतात. दक्षिण भारतातल्या काही मंदिरांतही ही पद्धत आढळते. बालीमधल्या सगळ्या देवळांत असे सारोंग गुंडाळून जाणे अनिवार्य आहे. हे जरी पार्क असले तरी यातल्या काही मूर्ती प्रत्यक्ष पुजल्या जात होत्या. त्यामुळे केवळ त्या ठिकाणी सारोंग गुंडाळणे आवश्यक होते. कॅमेरा सरसावून मी आत शिरलो. सुरुवातीलाच एक प्रशस्त मैदान दिसले. त्याच्या चारी बाजूंनी ग्रॅनाइटचे उभे कापलेले कडे होते. या टेकडीवर असा खडक विपुल होता. त्यातूनच इथल्या प्रचंड मूर्ती घडवल्या होत्या. मैदानाच्या वरच्या बाजूला गरुडची मूर्ती होती. हा गरुड मोठ्या भक्तिभावाने मुख्य मूर्तीकडे बघताना दिसत होता. त्याच्याच दुसर्‍या बाजूला विष्णूची अर्धमूर्ती होती. ही मूर्ती प्रत्यक्ष पूजेत असल्याने इथे सारोंग गुंडाळणे आवश्यक होते. इथले वातावरण अगदी भारतातल्या देवळांत असते तसे होते. कलकलाट मात्र अजिबात नव्हता. उदबत्त्यांचा सुगंध प्रसन्न वाटत होता. दूरवर गरुडावर स्वार झालेल्या विष्णूची महाकाय मूर्ती दिसत होती. सगळी शिल्पे अत्यंत सुबक आणि रेखीव होती. निळ्याभोर आकाशाच्या पार्श्व्भूमीवर ते शिल्पसौंदर्य फारच मोहक वाटत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी मुख्य मूर्तीकडे निघालो. सुमारे 75 मीटर उंच आणि 65 मीटर रुंद अशी ही मूर्ती इंडोनेशियामधली सगळ्यात उंच मूर्ती आहे. ज्या इमारतीवर ही मूर्ती उभारली आहे तिची ऊंची पकडली तर एकूण ऊंची 122 मीटर भरते. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडले आणि ते घ्यायला गरुडावर स्वार होऊन विष्णु निघाला असा प्रसंग या मूर्तीतून साकारला गेला आहे. मूर्ती निश्चितच सुंदर होती. विष्णूच्या चेहर्‍यावरचे भाव, गरुडाचा आवेश, त्याच्या पंखांवरची पिसे, सारेच अप्रतिम होते. मूर्तीवर बसवलेले सोन्याचे तुकडे उन्हात चमकत होते. खालच्या इमारतीमध्ये एक भव्य संग्रहालय होते. त्याची गाइडेड टूर लवकरच निघणार होती. पण त्याचे जास्तीचे तिकीट बघून मी माघारी वळलो.
गरुडा-विष्णु-काञ्चना पार्कमधले ताशीव कडे    

मुख्य मूर्तीकडे बघणारी गरुडाची मूर्ती


गरुडावर स्वार असलेली विष्णूची मुख्य मूर्ती

पार्कच्या दुसर्‍या टोकाला एक आलीशान उपहारगृह होते. तिथून टेकडीखालचा रम्य परिसर दिसत होता. दूरवर निळा समुद्र शांत पहुडला होतापार्कच्या तिकीटावर इथे एक सरबत मोफत मिळणार होते. मी ते घेतले आणि जरा वेळ विसावलो. तेवढ्यात कुठूनतरी तालवाद्यांचे स्वर कानावर पडले. बाजूलाच एक लहानसे स्टेज होते आणि त्यावर लोकनृत्याचा कार्यक्रम सुरू  होता. पंधरा मिनिटांचा एक कार्यक्रम दर अर्ध्या तासाने होत होता. उत्सुकतेने मी बघायला गेलो. वाद्यांचे स्वर ऐकायला छान वाटत होते. तेवढ्यात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या काही नर्तकी अवतरल्या. त्यांचे मुद्राविनेश थोडेफार भारतीय अभिजात नृत्यासारखे वाटत होते. मग काही प्राण्यांचे वेश घातलेले नर्तक अवतरले. हा प्रकार थोडाफार पूर्व आशियाई देशांसारखा वाटत होता. एकंदरीत भारतीय आणि पूर्व आशियाई संस्कृतींचा उत्तम संगम त्या कार्यक्रमात दिसून येत होता. मी थोडेफार फोटो काढले आणि पार्कमधून बाहेर पडलो.

पार्कमधले आलिशान उपहारगृह 
बालिनीज लोकनृत्य

प्राण्यांचे पोशाख घातलेले नर्तक

क्रमशः

 उलूवातूचा रम्य सूर्यास्त

 

गरुडा-विष्णु-कांचना पार्कमधून बाहेर पडलो आणि उलूवातूच्या दिशेने निघालो. आता चांगलीच भूक लागली होती. रस्त्यात बरीच उपहारगृहे दिसत होती. पण मनासारखे काही दिसत नव्हते. तेवढ्यात पाटी दिसली सुलूबान बीच अशी. मस्तपैकी बीचवर बसून जेवण करू असं म्हणून मी बीचकडे वळलो. हा बीच म्हणजे क्लिफ बीच होता. म्हणजे थेट समुद्रात उतरणारा डोंगरकडा आणि त्याखाली थोडीफार पुळण. खाली उतरायला पायर्‍या बांधलेल्या होत्या. पायर्‍यांच्या बाजूने कड्याला बिलगूनच असंख्य उपहारगृहे होती. दिसणारे दृश्य जितके सुंदर तितक्या पदार्थांच्या किमती जास्त असे गणित होते. इथल्या लाटा सर्फिंगसाठी अनुकूल होत्या. त्यामुळे सर्फिंगचे सामान विकणारी आणि सर्फिंग शिकवणारी बरीच दुकाने होती. आधी बीच बघून येऊ असे म्हणून मी पायर्‍या उतरू लागलो. वाट जरा निसरडीच होती. जसजसे खाली उतरू  लागलो तसा लाटांचा जोरदार आवाज येऊ लागला. दोन कड्यांचा मध्ये एक घळई निर्माण झाली होती. काहीसे गूढ वाटत होते. आजूबाजूला एक-दोन गुहा देखील होत्या. पुळण अगदीच अरुंद होती. लाटा वेगाने आदळत होत्या. किनारा बहुतांश खडकाळच होता. बसायला अशी जागा नव्हतीच. मग मी सरळ वर आलो आणि एका उपहारगृहात शिरलो. फ्राइड राईस मागवला आणि समोरचे दृश्य बघत बघत खाऊ लागलो. इंडोनेशिया मध्ये शाकाहारी जेवण मिळणे फार अवघड नाही. इथल्या जेवणात मोठ्या प्रमाणात भाज्या, भाताचे विविध प्रकार, नारळाचे दूध, वगैरे पदार्थ असतात. इंडोनेशियन जेवणाबद्दल पुढे सविस्तर लिहिनेच. जेवण आटोपून मी उलूवातूच्या प्रसिद्ध मंदिराकडे निघालो.


सुलूबानचा क्लिफ बीच

बीचकडे जाणार्‍या पायर्‍या 

बीचवर असलेली घळई 

सुलूबानचा खडकाळ किनारा 

एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलू लागली होती. सूर्यास्ताच्या आधी मंदिर व्यवस्थित पाहता यावे म्हणून मी स्कूटरचा वेग वाढवला. तेवढ्यात मंदिराची पाटी दिसलीच. पार्किंगची जागा गाड्यांनी भरून गेली होती. एकंदरीत आत जत्रा असणार याचा अंदाज आला होता. मंदिराबाहेर भाड्याने मिळणारे सारोंग नेसून मी आत शिरलो. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नव्हतेच. पर्यटक मंदिराचे पावित्र्य नष्ट करतील म्हणून बाली मधल्या बर्‍याच मोठ्या मंदिरांत पर्यटकांना प्रवेश निषिद्ध आहे. बाली मधली मंदिरे म्हणजे एक मोकळे प्रांगण आणि त्यात उतरत्या छपरांचे मनोरे अशी रचना असते. तशीच इथेही होती. बाहेरून प्रांगणाच्या भिंतीवरचे कोरीवकाम आणि मनोर्‍यांची सुंदर रचना पाहता येत होती. पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्‍याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं. मंदिराच्या पाठीमागचा हा भाग गर्दीने खच्चून भरला होता. अर्धे तर भारतीयच दिसत होते. लाल टोप्या घातलेली मराठी मंडळीही दिसत होती. पलीकडच्या मोकळ्या भागात तिथे रोज सादर होणार्‍या रामायणावर आधारित शोची तयारी चालू होती. त्याची तिकिटे काढलेल्या लोकांनी आधीच तिकडे तोबा गर्दी केली होती. एवढ्या गर्दीने त्या सुंदर जागेचा पार विचका करून टाकला होता. मला तर तिथून निघून जावं असं वाटू लागलं होतं. तेवढ्यात लक्ष गेलं मागच्या बाजूने डोंगरकड्यालगत बांधलेल्या पायवाटेकडे. तिथे जरा कमी गर्दी दिसत होती.


उलूवातूचा डोंगरकडा आणि त्याच्या अंगाने जाणारी पायवाट  

मंदिराच्या मागे झालेली पर्यटकांची गर्दी 

मंदिराचे प्रवेशद्वार

मी सरळ त्या पायवाटेवरून चालू लागलो. थोड्या अंतरावरच एक बसायची जागा होती. इथून सूर्य अगदी समोर दिसत होता. लांबवर उलुवातूचे डोंगरकड्याच्या टोकावर असलेले मंदिर दिसत होते. गर्दी त्यामानाने कमी होती. मी तिथेच बसकण मारली आणि फोटो काढू लागलो. कलत्या सूर्याच्या प्रकाशात तो डोंगरकडा, खालचा समुद्र, फेसाळत्या लाटा, आणि लांबवरचे मंदिर, सारेच विलक्षण दिसत होते. सूर्यबिंब आता लाल-केशरी झाले होते. पाहता पाहता क्षितिजावरच्या धुरकट हवेने त्या केशरी गोळ्याला कवेत घेतले आणि अक्षरशः क्षणार्धात सगळा खेळ संपला! समुद्रात बुडणार्‍या सूर्याला बघायला आलेल्या सगळ्याच पर्यटकांचा हिरमोड झाला होता. निसर्गाच्या खेळापुढे आम्हा पर्यटकांच्या इच्छेची काय तमा? नाही म्हणायला थोडाफार केशरी प्रकाश उरला होता. थोडे अजून फोटो काढून मी तिथून निघालो. पायवाटेवर माकडांनी उच्छाद मांडला होता. कोणाचे खाऊचे पुडे, कोणाचे चष्मे, कोणाच्या बाटल्या, माकडं बिनधास्त ओढून घेऊन जात होती. आणि गोर्‍या पर्यटकांना त्याचे अगदी कौतुक! त्या सगळ्या कोलाहलातून वाट काढत आणि माकडांपासून सुरक्षित अंतर ठेवून मी पार्किंगच्या जागेकडे पोहोचलो. अंधार भराभर पडत होता. मी स्कूटर चालू केली आणि परतीचा रस्ता धरला.    


दूरवर दिसणारे मंदिर आणि अथांग समुद्र 

तुलेनेने कमी असलेली गर्दी 

म्हणता म्हणता नाहीसा झालेला सूर्य 

क्रमशः

 ग्रीन बाउल बीच आणि नुसा दुआ

 बालीचा दक्षिण किनारा म्हणजे एकापेक्षा एक सरस अशा बीचेसची मेजवानी आहे. समुद्र आवडणार्‍या पर्यटकांसाठी हा भाग म्हणजे जणू स्वर्गच. काल उलूवातू आणि सुलूबान असे दोन क्लिफ बीच पहिले होते. पण तिथल्या गर्दीने सगळा विचका केला होता. मग आज ठरवलं आधी नीट होमवर्क करायचा आणि मग शांत आणि सुंदर समुद्रकिनारे हुडकायचे. ब्रेकफास्ट करता करता हॉस्टेलमधल्या काही पर्यटकांशी बोललो. बहुतेक सगळे सर्फिंग किंवा पार्टिंग करणारे होते. मला त्यांपैकी काहीच नको होते. मग रिसेप्शनवर असलेल्या व्हिक्टरशी गप्पा मारू लागलो. परवा रात्री अडीच वाजता यानेच माझे चेक इन केले होते. त्यामुळे त्याच्याशी एव्हाना चांगली ओळख झाली होती. मला नक्की कशा प्रकारचा बीच हवा आहे हे मी त्याला समजावून सांगितले. मग त्याने काही जागा सुचवल्या. स्थानिक लोकांशी गप्पा मारल्या की एखाद्या ठिकाणच्या अशा काही गोष्टी कळतात की त्या कुठल्याच टुरिस्ट गाईडमध्ये सापडणार नाहीत. दिवसभराची रूपरेषा ठरवली आणि बाइक चालू केली. वातावरण आजही छानच होते.

ग्रीन बाउल बीच 

पार्किंगच्या जागेवरून दिसणारा ग्रीन बाउल बीच 

काल पार्ककडे जायला जे वळण घेतले होते त्याच्या अलिकडचे वळण घेऊन मी ग्रीन बाउल बीचकडे निघालो. हा बीच म्हणजे बालीमधला एक सगळ्यात सुंदर पण काहीसा दुर्लक्षित बीच समजला जातो. हा रस्ता पार्कच्या मागच्या बाजूने जात होता. काल पाहिलेली ती भव्य मूर्ती इथून वेगळ्याच दृष्टिकोनातून दिसत होती. गरुडाच्या पंखांचा विस्तार इथून चांगलाच नजरेत भरत होता. एका ठिकाणी थांबून तिथले फोटो काढले. तासाभरात ग्रीन बाउल बीचवर पोहोचलो. हाही क्लिफ बीचच होता. मात्र क्लिफच्या खाली बर्‍यापैकी रुंद पुळण होती. स्कूटर पार्क करून मी पायर्‍यांनी खाली उतरायला लागलो. गर्द हिरव्या झाडीतून पायर्‍या खाली उतरत होत्या. हिरव्यागार डोंगरउतारामुळेच कदाचित या बीचला ग्रीन बाउल बीच म्हणत असावेत. लाटांचा आवाज घुमत होता. पायर्‍या संपत आल्या आणि समोर बघतो तर काय, वेगाने आदळणार्‍या लाटा आणि त्यांचे उंच उडणारे तुषार. बीच गेला कुठे? भरतीच्या पाण्याचा आवेग एवढा प्रचंड होता की पाण्याने सगळा बीचच गिळून टाकला होता. बरेचसे पर्यटक तिथेच हताशपणे पायर्‍यांवर उभे होते. काही जण तसेच माघारी वळत होते. तसे उजव्या बाजूने थोड्याफार उरल्यासुरल्या वाळूवर जाता येत होते. पण लाटा एवढ्या उंच होत्या की दोन सेकंदांत माणूस चिंब भिजून जाईल. पाहिल्याच बीचवर भिजायची बिलकुल इच्छा नव्हती. आता काय? माझी चांगलीच फजिती झाली होती. पण इथे आलोच आहे तर थोडा वेळ बसूया असं म्हणून मी तिथेच बसकण मारली. उसळणार्‍या लाटांचे फोटो काढू लागलो. जागा तर सुंदरच होती. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या सार्‍या छटा तिथे एकवटल्या होत्या. डोंगरउतारावरच्या झाडांचा गर्द हिरवा रंग समुद्राने जणू उसना घेतला होता. समोरच्या खडकावर आदळून पाण्याचे तुषार सर्वत्र उडत होते. तिथे बसून मी अगणित फोटो काढले. कॅमेर्‍याची वेगवेगळी सेटिंग्स वापरुन पाहिली. शेवटी भूक लागल्याचे जाणवताच माघारी वळलो.

वेगळ्या दृष्टीकोनातून दिसणारी पार्कमधली मूर्ती  

भरतीच्या पाण्यात गायब झालेला बीच  

बेभान आदळणार्‍या लाटा 

पुढचा बीच होता पंडावा बीच. हा तसा मोठा आणि गर्दीचा बीच होता. पण इथे काहीतरी खायला मिळेल अशा आशेने मी तो निवडला होता. अर्ध्या तासातच तिथे पोहोचलो. रस्ता जिथून खाली बीचकडे वळत होता त्या वळणावर एक मस्त फोटो स्पॉट बांधला होता. तिथे जरा वेळ थांबलो. समोरचा अथांग समुद्र फारच सुंदर दिसत होता. थोडीफार गर्दी होती. पण अगदीच कोलाहल नव्हता. मग खाली उतरून बीचवर पोहोचलो. किनार्‍यालगत असंख्य हॉटेल्स होती. एका लहानशा हॉटेलमध्ये शिरलो आणि व्हेज नूडल्स मागवले. समोरचा समुद्र बघत जेवण केले आणि पुढच्या बीचकडे निघालो. हा पुढचा बीच म्हणजे एक लहानसा आडवाटेवरचा बीच होता. गुनुंग पयांग नावाचे एक लहानसे मंदिर होते. त्याच्या खाली काहीसा खडकाळ असा किनारा होता. इथे तर अक्षरशः कुणीच नव्हते. समुद्रही शांत दिसत होता. भरती असल्याने पुळण फारशी दिसत नव्हतीच. मात्र त्यावरून चालता येत होते. वारा मंद सुटला होता. इथे मी एका दगडावर शांतपणे बसलो. घरी एक व्हिडिओ कॉल केला. तिथली शांतता मनसोक्त अनुभवली आणि नुसा दुआच्या दिशेने निघालो.

पंडावा बीच 

पंडावा बीचकडे जाणारा रस्ता आणि समोर दिसणारा अथांग समुद्र 

पंडावा बीचवरचा फोटो स्पॉट 

अखेरीस सापडलेला शांत समुद्रकिनारा 

इथलं पानी कमालीचं शांत होतं 

नुसा दूआ म्हणजे बालीमधले पंचतारांकित रिसॉर्ट टाउन. ऐषारामी पर्यटकांसाठी बांधलेली जागा. इथला परिसर निश्चितच सुंदर होता. रुंद रस्ते, सुंदर बागा, प्रत्येक चौकात सुरक्षारक्षक असा चोख बंदोबस्त होता. मी इथे आलो होतो ते वॉटरब्लो नावाची जागा बघायला. इथे खडकांची नैसर्गिक रचना अशी काही बनली आहे की समुद्राचे पाणी वेगाने आदळते आणि खडकाला असलेल्या भोकांतून कारंज्यासारखे वर उसळते. आज भरतीचा दिवस असल्याने इथे पाण्याचा खेळ छान बघायला मिळेल अशा आशेने मी तिथवर पोहोचलो. खडकांची रचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण होती. सततच्या पाण्याच्या आघाताने त्या खडकावर सुरेख आकार बनले होते. आता उसळणारे पाणी कुठे दिसतेय ते शोधू लागलो. पण आजचा सगळा दिवसच फजितीचा होता. दुपारी नको तेवढा उसळणारा समुद्र आता काहीसा शांत झाला होता. कारंजं कसलं, पिचकारीतून पाणी उडवावं तसं अधूनमधून खडकातून पाणी वर उडत होतं. काय तरी नशीब माझं! जिथे शांत बीच हवा होता तिथे समुद्राच्या लाटांनी कहर केलेला. आणि जिथे उंच उसळणारे पाणी बघायला आलेलो तिथे जलाधिराज विश्राम अवस्थेत गेलेला. असो. भटकंती म्हटली की असे फजितीचे प्रसंग यायचेच. त्यातही एक वेगळी मजा असते.

पाण्याच्या आघाताने खाडकावर बनलेले सुरेख आकार 

उंच लाटांची नुसती प्रतिक्षाच 

हॉस्टेलवर परतलो तेव्हा जेमतेम साडेसहा वाजले होते. अजून सगळी संध्याकाळ बाकी होती. मग हॉस्टेलच्या मागच्या बीचवर गेलो. गुगलवर सर्च करून एक मस्त रेस्तोरंट शोधलं. एक बियर मागवली आणि बसलो. अंधार पडत आला होतं. जांभळ्या संधीप्रकाशात सारा परिसर रम्य वाटत होता. मग पाड थाई हा पदार्थ मागवला. हा पदार्थ मूळचा थाई असला तरी सगळ्या दक्षिण-पूर्व देशांत प्रसिद्ध आहे. जेवण संपवून मी कुटामधल्या मुख्य रस्त्यावर फेरफटका मारायला निघालो. उद्या बालीच्या जवळच असलेल्या नुसा लेंबोंगान या बेटावर जायचा बेत आखला होता. त्यासाठी एक टुर बूक करावी लागते. त्याची थोडीफार चौकशी केली. एकंदरीत व्हिक्टरने सांगितलेली कंपनीच सगळ्यात स्वस्त वाटत होती. मग मी त्यांना फोन करून उद्याचे बुकिंग करून टाकले. उद्या हॉस्टेलही सोडायचे होते. मग लगेच परत येऊन समान बांधून ठेवले आणि बेडवर आडवा झालो.                 

क्रमशः

मुक्काम पोस्ट ऊबुद

 नुसा लेंबोंगानची सहल आटोपून मी सनूर पोर्टवर पोहोचलो तेव्हा साधारण सहा वाजले होते. आता कुटामधल्या हॉस्टेलवर जाऊन बॅग घ्यायची होती आणि ऊबुदला जायचे होते. मग लगेचच स्कूटर चालू केली आणि हॉस्टेलच्या दिशेने निघालो. सकाळी मोकळा दिसलेला हा रस्ता आता मात्र वाहनांनी खचाखच भरला होता. अक्षरशः बंगलोर किंवा मुंबईची आठवण व्हावी एवढं ट्रॅफिक होतं. आधीच स्नोर्केलिंगमुळे थकलो होतो. त्यात या ट्रॅफिकने जीव नकोसा केला होता. अखेरीस इंच इंच लढवत दीड तासाने मी हॉस्टेलवर पोहोचलो. रिसेप्शनवर विक्टरच होता. मला इथून ऊबुदला जायचे आहे असं समजताच त्याने मला अजून एका तासाने निघण्याचा सल्ला दिला. बाहेर ट्रॅफिक किती होतं ते मी अनुभवलं होतंच. तशीही मला थोडी विश्रांती हवी होती. मग मी तिथून बॅग उचलली आणि जवळच्या उपहारगृहात जेवायला गेलो. आज परत भात आणि भाज्या खायची इच्छा नव्हती. मग एक पिझ्झा मागवला. जेवण होईपर्यंत नऊ वाजलेच. गुगलवर ट्रॅफिक बघितले. विक्टर म्हणाला तसे एव्हाना ट्रॅफिक कमी झाले होते. मग सुसाट निघालो ऊबुदच्या दिशेने. खरे तर ऊबुदचा रस्ता सनूर पोर्टवरूनच जात होता. किंबहुना सनूर पोर्ट ऊबुद आणि कुटाच्या बरोब्बर अर्ध्या अंतरावर होते. सकाळीच बॅग घेऊन निघालो असतो तर एवढा हेलपाटा पडला नसता. आणि पोर्टवर बोट कंपनीच्या ऑफिसमध्ये बॅग पण ठेवता आली असती. थोडा प्लॅन चुकलाच. असो. 

ऊबुद मधील वैशिष्ट्यपूर्ण राईस टेरेस 

ऊबुद म्हणजे बालीची सांस्कृतिक राजधानी. बालीच्या मध्यवर्ती भागात काहीशा डोंगराळ भागात वसलेले हे शहर इथल्या योग प्रशिक्षण केंद्रांसाठी आणि वीगन खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही प्रसिद्ध मंदिरे, भातशेती, पुरातन राजवाडे आणि वस्तुसंग्रहालये या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. या जागेचा इतिहास अगदी आठव्या शतकापर्यंत जातो. त्या काळी जावा बेटावरून ऋषि मार्कंडेय इथे आले आणि इथल्या दोन नद्यांच्या संगमाजवळ त्यांनी ध्यानधारणा केली. पुढे त्यांनी त्या जागी गुनुंग लेबाह या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. इथल्या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडत. स्थानिक भाषेत उबद म्हणजे औषध. म्हणूनच या जागेला ऊबुद असे नाव मिळाले. पुढच्या चारशे वर्षांत इथे अनेक मंदिरे आणि धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्था बांधल्या गेल्या. त्यामुळे या जागेचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले. चौदाव्या शतकात माजापहीत साम्राज्याखाली आल्यानंतर इथली संस्कृती बहरत गेली. त्या काळात रूढ झालेल्या चालीरीती आजही इथल्या समाजात दिसतात. साधारण विसाव्या शतकात बालीमधले पर्यटन वाढू लागले. ऊबुदचे सांस्कृतिक महत्त्व आणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य यांमुळे ही जागा लवकरच एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनली. 

ऊबुदमध्ये माझा दोन रात्री मुक्काम होता. इथे एक होमस्टे बुक केला होता. पोहोचेपर्यंत साडेदहा वाजले होते. होमस्टेचे यजमान कुटुंब झोपायच्या तयारीत होते. यजमान बाई अगदीच प्रेमळ होत्या. एवढा उशीर झाला होता तरी त्यांनी यथोचित आगत-स्वागत केले. दिवसभरच्या दगदगीने मी पार थकलो होतो. चेक इन करून लगेच झोपी गेलो. सकाळी जरा उशीराच उठलो. आज तसेही इथले आसपासचे स्थलदर्शन करायचे होते. यजमान बाई नाश्ता बनवत होत्या तोपर्यंत मी जरा घर आणि आजूबाजूचा परिसर पहायला निघालो. अगदी टिपिकल बालीनीज पद्धतीचे घर होते. घराच्या प्रांगणातच एक लहानसे मंदिर होते. आपल्याकडे जुन्या वाड्यांत जसे मोठे देव्हारे असतात तसाच काहीसा प्रकार वाटत होता. बालीमधल्या प्रत्येक घरात असे एक मंदिर असते. असे म्हणतात की बालीमध्ये घरे कमी आणि मंदिरे जास्त आहेत. मंदिराच्या पायरीवरच एका पानांच्या परडीवर फुले आणि उदबत्या ठेवलेल्या होत्या. याला कानांग सारी असे म्हणतात. आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो तसे इथे मंदिराच्या किंवा घराच्या बाहेर कानांग सारी ठेवायची पद्धत आहे. घरातले मंदिर अगदी सुबक होते. प्रवेशद्वारावरच एक सुंदर गणपतीची मूर्ती होती. आतमध्ये बरेच मनोरे होते. प्रत्येकावर उतरती छपरे होती. मध्यभागी पद्मासन होते. सगळी रचना अत्यंत सुबक आणि नीटनेटकी होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात नाश्ता तयार असल्याचे बाईंनी सांगितले. काळा भात आणि त्यावर नारळ आणि गुळाचा पाक असा बेत होता. सोबत काही फळे होती. काळा भात बघून माझे जर्मनीत असतानाचे त्याबाबतीतले फसलेले प्रयोग आठवले. नक्की घशाखाली जाईल की नाही याची चिंता वाटू लागली. शेवटी सगळे विचार बाजूला सारून मी पहिला घास खाल्ला. आणि काय चव होती! काळ्या भाताचा सुगंध काहीसा वेगळाच होता. नारळ आणि गुळाच्या पाकामुळे थोडीफार नारळीभातासारखी चव वाटत होती. सगळा बेत मस्तच जमला होता. पोटभर नाश्ता करून मी स्थलदर्शनाला निघालो. 

घरासमोर ठेवलेले कनांग सारी 

यजमानांच्या घरात असलेले मंदिर आणि त्यातले मनोरे 

मंदिराच्या बाहेर असलेली गणपतीची मूर्ती 

ऊबुद म्हणजे निसर्ग आणि संस्कृती यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. माझा पहिला थांबा होता कांपुहान रिज वॉक. हा एक जवळच्या टेकडीवर जाणारा छोटासा ट्रेल होता. चढून जायचे असल्याने ही जागा मी पहिली निवडली होती. टेकडीच्या पायथ्याशी मी स्कूटर लावली आणि वर चढू लागलो. तितक्यात एक सुंदरसे मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूची हिरवळ, खालून वाहणारा नदीचा प्रवाह, आणि मंदिरातली गूढ शांतता, सारेच रम्य वाटत होते. ट्रेल तसा सोपाच होता. अनेक पर्यटक तिथून जात होते. नशीबाने फार गर्दी नव्हती. थोड्याच वेळात टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. इथून शहराचा सुदूर परिसर दिसत होता. आजूबाजूची हिरवाई प्रसन्न वाटत होती. साधारण दोनेक किमी लांबीचा ट्रेल असेल. मी दुसर्‍या टोकापर्यंत पोहचलो. तिथे एक छोटासा कॅफे होता. तिथे बसून एक मस्त कॉफी मागवली. बरेच पर्यटक तिथूनच शहराच्या दुसर्‍या भागात जात होते. मी मात्र स्कूटर टेकडीच्या पायथ्याशी लावलेली असल्याने तिथून परत मागे वळलो. थोडेफार फोटो काढून खाली उतरलो. पुढचा थांबा होता तेगालांग राईस टेरेस. डोंगरउताराला चरे पाडून सपाट जमीन बनवून त्यावर केलेली भातशेती म्हणजे राईस टेरेस. आपल्याकडे उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश या राज्यांत हा प्रकार आढळतो. बालीमधली ही अशा प्रकारची शेती कमालीची प्रसिद्ध आहे. नक्की त्यात काय विशेष आहे ते बघण्यास मी उत्सुक होतो. तिथवर पोहोचलो तर ही तोबा गर्दी! किती तरी वेळ पार्किंगला जागाच मिळेना. शेवटी एका दुकानदाराला जास्तीचे पैसे देऊन त्याच्या दुकानासमोर स्कूटर पार्क केली. राईस टेरेसचेही वेगळे तिकीट होते. एकदाचा आत शिरलो. समोर बघतो तर काय, एक लहानशी दरी होती आणि त्यात अधेमधे चरे पाडून भाताची रोपे लावली होती. मध्येमध्ये लाकडाच्या राहुटया उभारल्या होत्या. पर्यटक चिखलातून चालत होते आणि फोटो काढत होते. मधेच कुठे झोपाळे बांधले होते तर कुठे बदामाच्या आकाराचे प्रोप्स उभारून फोटो स्पॉट बनवले होते. नक्की शेत होते की सहलीची जागा हेच कळेना! आणि निदान दृश्य रम्य असावे तर तसेही काही खास नव्हते. आणि म्हणे वर्ल्ड हेरिटेज साइट! एकंदरीत ही जागा माझ्या खि फार पसंतीस पडली नाही. मी उपचारापुरते दोन-चार फोटो काढून तिथून बाहेर पडलो. 

टेकडीच्या पायथ्याचे मंदिर आणि वर जाणारी पायवाट 

रिज वॉक वरची हिरवाई  

कांपुहान रिज ट्रेल 

कॅफे कडे जाणारी वाट 

राईस टेरेस 

क्रमशः

 बालीतील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य 

 

रिज  वॉक आणि राइस टेरेस यांनी माझ्या ऊबुदच्या स्थलदर्शनाची सुरुवात झाली होती. पैकी राइस टेरेसने काहीसा अपेक्षाभंगच केला होता. आता आसपासची काही मंदिरे बघायची होती. एव्हाना दुपारचा एक वाजत आला होता. चांगलीच भूक लागली होती. वाटेत कुठेतरी थांबू असा विचार करत हळू हळू स्कूटर चालवत होतो. एवढ्यात एक भलेमोठे भाताचे शेत दृष्टीस पडले. इथे काही उतारावरची खाचा पाडलेली जमीन नव्हती. पण तरीही सर्वदूर पसरलेला पोपटी रंग फारच आल्हाददायक वाटत होता. फोटो काढूया असं म्हणून मी स्कूटर जरा बाजूला घेतली. तेवढ्यात बाजूच्या उपहारगृहातली तरुणी आत चला असा आग्रह करत बाहेर आली. एकंदरीत बरं दिसत होतं हॉटेल. मग मी थेट आत शिरलो. भाताचे शेत दिसेल अशी मोक्याची जागा निवडली आणि निवांत बसलो. दुर्भाग्याने इथल्या मेनूकार्डवर फार काही शाकाहारी पदार्थ नव्हते. मग तिथल्या वेटरलाच विचारलं, लगेच काय मिळेल. गाडो-गाडो हा इंडोनेशियन पदार्थ जवळपास तयारच होता. हा पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये, तोफू, सलाडची पाने, आणि उकडलेल्या भाजांचे मिश्रण असते. इंडोनेशियन शाकाहारी जेवणात हा पदार्थ लोकप्रिय आहे. समोरचे हिरवेगार शेत बघत बघत जेवण केले आणि पुढच्या जागेचा रस्ता नकाशावर शोधू लागलो.  

हिरवीगार भातशेती 

गाडो-गाडो 

आता वेळ आली होती मंदिरदर्शनाची. बाली जितकं समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे तितकंच इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरे भारतातल्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी असतात. मंडप, गाभारा, कळस, मूर्ती असं काहीच त्यांत नसतं. असते ते एक मोठे प्रांगण. हे प्रांगण तीन भागांत विभागलेले असते, ज्यांना मंडल म्हणतात. त्यांपैकी बाहेरचा भाग म्हणजे निष्टा मंडल किंवा जाबा. हा भाग कमी पवित्र मानला जातो. या भागात बाले कुलकुल म्हटले जाणारे ढोल लटकवलेले मनोरे असतात. हा ढोल वाजवून गावकर्‍यांना घोषणा करण्यासाठी एकत्र बोलावले जाते. या भागाचे प्रवेशद्वार हे कमान असलेले असते आणि बाहेर दोन द्वारपाल असतात. त्यापुढे असते मद्य मंडल किंवा जाबा तेंगाह. या भागाचे प्रवेशद्वार विभाजित असते आणि त्यावर कमान नसते. याला कांडी बेंतार असे म्हटले जाते. बालीमध्ये सर्वत्र दिसणारा हा स्थापत्यघटक म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आहे. स्थानिक पुराणानुसार शंकराने मेरू पर्वत भारतातून बालीमध्ये आणला आणि दोन भागांत विभागला. हे दोन भाग सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात कायम संतुलन असावे असा संदेश देतात. मद्य मंडलात काही ढोल असलेले मनोरे तर काही मंडप असतात. सगळ्यात आतमध्ये असते उतमा मंडल किंवा जेरोअन. हे सगळ्यात पवित्र मंडल समजले जाते. यात पूर्वजांचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे असतात. मंदिरात सर्वत्र आढळणारा स्थापत्यघटक म्हणजे पद्मासन. बहुतेक सगळ्या हिंदू देवता इथल्या धर्मात पूजनीय असल्या तरी हा धर्म एकेश्वरवादी आहे. यांचा ईश्वर, ज्याला सांग हयांग विधी वासा म्हटले जाते, तो निर्गुण व निराकार आहे. त्याला कोणत्याही मूर्तीतून व्यक्त करता येत नाही. म्हणून दगडातून घडवलेले एक आसन, ज्याला पद्मासन म्हणतात, सर्वत्र उभारले जाते. असे मानले जाते की प्रार्थनेच्या वेळी विधी वासा या आसनावर अवतरतो व स्थानापन्न होतो. सोळाव्या शतकातील एक धर्मगुरू दांग हयांग निरर्था यांनी मांडलेल्या तत्वज्ञानावर ही मंदिर रचना आधारित आहे. एकंदरीत भारतातील हिंदू घटकांचा प्रभाव असलेली पण स्थानिक श्रद्धास्थानांचा अंतर्भाव करणारी इथली मंदिररचना फारच इंट्रेस्टिंग आहे.

माझ्या रूपरेषेतले पहिले मंदिर होते गुनुंग कावी सेबतू. हे मंदिर एका लहानशा टेकडीच्या बाजूला होते. फारसे प्रसिद्ध नसल्याने इथे गर्दी नव्हती. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. सारोंग गुंडाळून मी आत गेलो. एका बाजूला एका तळ्याच्या मध्यात वीणावादन करणार्‍या सरस्वतीची शुभ्र पांढरी मूर्ती होती. मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकार, चेहर्‍यावरचे पवित्र भाव, सारेच अद्भुत होते. त्या रम्य वातावरणात ती सुंदर मूर्ती इतकी लोभस वाटत होती की मी तिथेच बराच वेळ फोटो काढत बसलो. मग मंदिराचे इतर काही भाग बघितले. दुसर्‍या टोकाला अजून एक तळे होते. त्याच्या काठाशी सजवलेले पद्मासन होते. मागे असलेल्या हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर ते पद्मासन फारच विलोभनीय वाटत होते. मंदिराच्या उतमा मंडलात पर्यटकांना प्रवेश नव्हता. मग मी तिथे थोडेफार अजून फोटो काढून पुढच्या मंदिराकडे वळलो.

तळ्याच्या मध्यात असलेली सरस्वतीची मूर्ती 

मंदिरातील कुंड 

मंदिराचा रम्य परिसर 

पद्मासन 

सरस्वतीच्या चेहऱ्यावरचे भाव 

पुढचे मंदिर होते पुरा तीर्था एमपुल. Holy Spring Water Temple या नावाने हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. अपेक्षेप्रमाणे इथे बर्‍यापैकी गर्दी होती. जवळच्या एका झर्‍याचे पाणी इथे एका कुंडातून सदासर्वकाळ वाहत असते. त्याखाली आंघोळ करून मग आत प्रार्थनेसाठी जायचे असा रिवाज आहे. बघतो तर कुंडात आंघोळ करायला ही मोठी रांग. शिवाय स्वतःच्या वस्तू ठेवायला लॉकरची वेगळी रक्कम. मी तो विचार सोडून दिला आणि सारोंग गुंडाळून थेट मंदिरात शिरलो. हे मंदिर तसे प्रशस्त होते. पाण्याचे कुंड अपेक्षेपेक्षा फारच स्वछ दिसत होते. लोकही शिस्तीत उभे होते. काश भारतात कधी असे चित्र बघायला मिळेल. मंदिरातले एक द्वार फारच सुंदररित्या सुशोभित केले होते. इथे सेलफी काढायला लोकांची रांग लागली होती. उतमा मंडलात प्रवेश नव्हताच. पण आतमध्ये पारंपरिक पोषाखातील काही स्थानिक लोक प्रार्थना करत होते. एक पुजारी त्यांना संबोधित करत होता. उदबत्त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. प्रत्येकाने आपापले कनांग सारी पूजेकरता आणले होते. कुठलाही गोंगाट नाही, घंटांचा खणखणाट नाही, ढकलाढकली नाही. केवळ शांतपणे केली जाणारी प्रार्थना. त्यांचे विधी आणि रिवाज बघत मी थोडा वेळ थांबलो. फार छान वाटलं.  

कुंडात आंघोळ करणारे पर्यटक 

जवळचे दुसरे कुंड 

प्रार्थना करणारे स्थानिक लोक 

पुढचं मंदिर होतं पुरा गुनुंग कावी. हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेल्या छेदाष्म थडग्यांसाठी प्रसिद्ध आहे. उदयान साम्राज्यातील राजा अनक वांगसु याच्या राण्या आणि संतती यांच्यासाठी असलेली ही थडगी पेरकसान नदीच्या दोन बाजूंनी असलेल्या डोंगरांत कोरलेली आहेत. मंदिराच्या बाहेर स्कूटर लावली तेव्हा ढग दाटून आले होते. मंदिर नदीच्या खोर्‍यात होते. बर्‍याच पायर्‍या खाली उतरून जायचे होते. मी खाली उतरु लागलो आणि तेवढ्यात बारीक पावसाला सुरुवात झाली. पायर्‍या संपल्या आणि समोर एक भाताचे शेत दिसू लागले. दाटून आलेले ढग, भुभुरणारा पाऊस, लांबून येणारा नदीच्या प्रवाहाचा आवाज, हिरवीगार भातशेती, सारेच विलोभनीय होते. तिथून पुढे अजून काही पायर्‍या उतरून थडग्यांच्या परिसरात पोहोचलो. उंच ताशीव कड्यांमध्ये गुहा कोरून त्यात मंदिराच्या कळसासारखी शिल्पे कोरली होती. ते बघून मला अजिंठा-वेरूळची लेणी आठवली. किंबहुना जॉर्डन मधील पेट्रा येथील थडगी या थडग्यांशी अधिक मिळतीजुळती होती. समोर नदीचा प्रवाह खळाळत होता. काठाने उंच आणि दाट झाडं होती. एखाद्या घनदाट अरण्यात यावं आणि समोर एखाद्या पुरातन स्मारकाचे अवशेष सापडावेत तसं वाटत होतं. तिथे थोडेफार फोटो काढले आणि मागे वळलो.

दरीतली भातशेती 

दाट झाडीतून वाहणारी नदी आणि मागची मंदिरे 

छेदाष्म थडगी 

पावसाळी वातावरणात तिथे गूढ वाटत होते 

हिरवीगार दरी 

आता आजचे शेवटचे मंदिर होते गोवा गजह मंदिर. उघडं तोंड असलेल्या आकाराच्या गुहेसाठी हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा होता. तिकीट काढून आणि सारोंग गुंडाळून मी आत शिरलो. डाव्या हाताला गुहा होती. फोटोत दिसते त्यापेक्षा ही गुहा लहानच होती. वाकून मी आत शिरलो. उदबत्त्यांचा धूर पसरला होता. आतली उष्णता, आर्द्रता, आणि धूर यांमुळे घुसमटायला होत होतं. गुहेत एका बाजूला गणपतीची मूर्ती होती तर एका बाजूला शिवलिंग होते. आत काही फार वेळ थांबता येत नव्हतं. मी लगेचच बाहेर आलो. बाहेरचे मंदिर काहीसे इतर मंदिरांसारखेच होते. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे आणि पद्मासन दिसत होते. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भलेमोठे पाण्याचे कुंड. यात सात देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी अशा भारतातल्या सात नद्यांचे प्रतिनिधित्व करतात. पलीकडे एक वाट एका दरीत उतरताना दिसत होती. तिथे काही बौद्ध स्तूप आणि लहान मंदिरे होती. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो.

आज दिवसभर चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे आता जीव थकला होता. मी लगेच होमस्टेवर परतलो. एव्हाना सात वाजलेच होते. थोडा वेळ विश्रांती घेऊन जेवायला बाहेर पडलो. ऊबुद मधला मुख्य बाजार रस्ता हाकेच्या अंतरावर होता. तिथे थोडा वेळ फेरफटका मारून मोक्षा कॅफे नावच्या प्रसिद्ध उपहारगृहात जेवायला गेलो. आतला अॅम्बियन्स छानच होता. बसायला बैठक आणि चौरंगासारखे टेबल होते. मुख्य म्हणजे हे उपहारगृह संपूर्ण वीगन होते. भारताबाहेर अशी जागा सापडणे आधीच मुश्किल. इथे तर स्थानिक आणि पाश्चात्त्य अशा वेगवेगळ्या संपूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल होती. मग त्यातला बालीनीज करी हा पदार्थ मागवला. ही करी तशी थाई करीसारखीच होती. पण मसाले काहीसे वेगळे होते. मनसोक्त जेवून मग मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. उद्या चेक आऊट करायचे होते. मग सामान बांधून ठेवून झोपी गेलो.

गोवा गजह मंदिरातील कुंड आणि नद्यांच्या मूर्ती 

मंदिरातील प्रसिद्ध गुहा 

गुहेतील गणपतीची मूर्ती 

गुहेतील शिवलिंगे 

दरीत उतरणारी वाट 

क्रमशः 






 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...