माझा भुताखेतांवर किती विश्वास आहे, हे मलाच माहिती नाही. भुतासारखी अक्राळविक्राळ माणसे बरीच भेटली. त्यांना सहन केल्यामुळे कदाचित भीती थोडी कमीही झाली असेल. पण खरे सांगायचे तर, अतींद्रिय शक्ती या विषयावर माझे मत अजून तयार व्हायचे आहे. अर्थात भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती.
आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत. दिव्य आंतरजालीय प्रथेनुसार दोन्ही बाजूंचे प्रवक्ते (भूत आहे / भूत नाही) हमरीतुमरीवर येऊन भांडतात.
भानगड हा दौसा शहरापासून २५ कि.मी. वर आहे. जयपूर-आग्रा महामार्गावरून
आत वळावे लागते. कुठेही दिशादर्शक पाटी नसल्यामुळे योग्य रस्ता शोधणे
हीदेखील एक भानगडच होऊन बसते.
आम्हाला निघायला थोडा (बराच!) उशीर झाल्यामुळे किल्ल्याच्या दरवाजाशी पोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले. पुरातत्व खात्याच्या पहारेदाराला त्यामुळे थोडा वैताग-कम-राग आल्यासारखा वाटला. "लवकर आटपा" अशी सूचनावजा धमकी देत त्याने आम्हाला आत जाऊ दिले. किल्ला साडेसहा वाजता बंद होत असल्यामुळे आमच्या हातात एक तासाहून कमी वेळ होता.
भानगड या नावाची कीर्ती काहीही असली, तरी पुरातत्व खात्याने लावलेल्या फलकांवर मात्र भूत, प्रेत, आत्मा, सैतान या सर्वांचा उल्लेख पूर्णपणे टाळलेला आहे, हे पाहून थोडे हसू आले.
किल्ल्यात शिरताच एका गोष्टीची मात्र पुरेपूर खात्री झाली: जर भुतेखेते खरेच असली तर त्यांना भानगडसारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही. एकदम प्राईम प्रॉपर्टी! स्विश अॅड्रेस! म्हणजे काय, की "भुताळी किल्ला" हे शब्द उच्चारताच जे चित्र डोळ्यासमोर येते, ते भानगडच्या रूपाने हुबेहूब प्रकट झाले आहे की काय असे वाटावे. याची कारणे खालीलप्रमाणे:
१. किल्ला जरी भुईकोट असला, तरी त्याच्या तिन्ही बाजूंनी कराल कडे उंच उठलेले आहेत. शिखरांच्या पलीकडे सरिस्का व्याघ्र अभयारण्य पसरलेले आहे. त्यामुळे त्याबाजूने यायला रस्ता नाही.
२. किल्ला जवळच्या गावापासून मैलभर दूर आहे. आसपास घरे, दुकाने, रस्ते असे काहीही नाही. केवळ निबिड जंगल आहे.
३. आडबाजूला असल्याकारणाने पर्यटकही कमी असतात.
४. माकडे आणि मोर मुबल़क संख्येने आढळतात. माणसांची त्यांना फारशी भीती वाटताना दिसत नाही.
५. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ला बराचसा सुस्थितीत आहे. आत तीन मंदिरे, एक तलाव आणि एक उंच बालेकिल्ला आहे.
या बालेकिल्ल्याचा समोरचा भागात पूर्वी तुरुंग होता. त्याच्या कोठड्यांचे दरवाजे एखादा विक्राळ जबडा उघडल्यासारखे भासतात.
काही भागाची मात्र पडझड झालेली आहे.
किल्ल्याच्या भिंतींजवळ रान माजलेले आहे. भानगड हे एक संरक्षित स्मारक असले, तरी कोणत्याही बाजूने उडी मारून आत प्रवेश करणे कठीण नाही.
किल्ल्यात एक लांबच लांब बाजारपेठ आहे. यामधील एकूण एक दुकानांची छपरे उडालेली आहेत. असे म्हणतात की प्राचीन शापाच्या प्रभावामुळे नवे छप्पर टाकले तरी ते टिकत नाही.
किल्ल्याबद्दल अनेक वदंता प्रचलित आहेत. त्यामध्ये राजे, राजकुमारी, साधू, वासंनांध जादूगार, काळी जादू, रक्तपात, कत्तली, युद्धे, दगाबाजी अशा सुरस, चमत्कारिक गोष्टींची रेलचेल आहे. (इच्छुकांनी विकिपीडिया पहावा).
भुताखेतांची खिल्ली उडवणारे बेडर कंपूदेखील मागे नाहीत. त्यांनीही या कथा खोडून काढलेल्या आहेत (इच्छुकांनी गूगल करून पहावे).
एका उंच कड्यावर, दूर, एकाकी अशी एक राजस्थानी छत्री उभी आहे. असे म्हणतात की शापवाणी उच्चारणारा तो सैतानी जादूगार इथे बसत असे.
किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ एक नवीन हनुमान मंदिर आहे.त्याचा पुजारी भुताखेतांची कल्पना उडवून लावतो. "माणसापेक्षा भयंकर भूत दुसरे नसतेच," हा त्याचा दावा आहे.
पण रात्री तो देवळाला कुलूप ठोकून झोपायला घरी जातो!
असा हा भानगड. आता मला जर विचाराल की "बाबा, एक रात्र या किल्ल्यात राहून दाखवशील का?", तर उत्तर द्यायला जरा कठीण जाईल.
आहेत का कुणी बहाद्दर?
******
हे ब्लॉग पोस्ट इंग्रजीमध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपात इथे वाचायला मिळेल.
भानगडः
जयपूरपासून साधारणपणे ९० कि.मी. (सकाळी निघून संध्याकाळी परत येता येते)
जवळचे शहर/ रेल्वेस्थानकः दौसा.
रस्त्याची परिस्थिती: जयपूर ते दौसा उत्तम चारपदरी महामार्ग. दौसानंतर साधा राज्यमार्ग.
जवळपास इतर पाहण्याजोगे: सरिस्का अभयारण्य, आभानेरी विहीर, अजबगड किल्ला.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.