तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ भिते पाटील, अॅड. मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता.
“लोणार” हा शब्द पहिल्यांदा केव्हा बरं ऐकला? शाळेच्या भूगोल नामक अजून एका सरकारी छळवाद पुस्तकात. “लोणार” म्हटल्यावर माझ्यासमोर डोळ्यासमोर पांढराशुभ्र लोण्याचा गोळा यायचा नेहमी. भूगोलाच्या पेपरात टिपा लिहा या सदराखाली ४ मार्कांसाठी येणारा हमखास प्रश्न आणि त्यासाठी केलेली घोकंपट्टी हा एवढाच काय तो मला वाटणारा जिव्हाळा या सरोवाराबद्द्ल. खरंतर पुस्तकात फक्त चित्र रुपाने भेटणारी ही ठिकाण आपण आयुष्यात खरीखुरी प्रत्यक्षात बघू शकतो हे माझ्या चिमुकल्या डोक्यात कधी यायचं नाही. या गोष्टी फक्त आणि फक्त पाठांतरासाठी असतात हे इतक पक्क मनात बसल होतं.
५० हजार वर्षापुर्वी अशनी पडुन हे विवर तयार झालं. अशाप्रकारे तयार झालेलं जगातलं हे तिसर्या क्रमांकाचं विवर बुलडाणा जिल्ह्यात आहे. १८२३ मध्ये जे. ई. अलेक्झांडर या ब्रिटीश अधिकार्याने याचा शोध लावला. असं जरी असलं तरी स्कंदपुराणात, पद्मपुराणात आणि आइना-ए-अकबरी यांमध्ये सुद्धा या जागेचा उल्लेख आहे. दंतकथेनुसार भगवान विष्णूने येथे लोणासुर नावाच्या दैत्यावर विजय मिळवला, त्यामुळे ठिकाणाचं नाव लोणार असं पडलं.
बेसॉल्ट म्हणजेच काळ्या खडकात ६ कि.मी परिघ असलेलं ह्या सरोवराचा आकार गोल, हॉटेल मध्ये सुप पिण्यासाठी खोलगट आकाराची जी वाडगी असतात तसा आहे. एवढया मोठ्या आकाराचा खड्डा, आणि तोही काळ्या कातळात करणारी अशनी किती मोठी असेल याचा आपण फक्त अंदाजच करु शकतो. आजुबाजूला गोड्या पाण्याचे स्रोत असले तरी या सरोवराचं पाणी खारं आहे, आणि नुसतच खारं नाही तर समुद्राच्या पाण्यापेक्षा ६-७ पटिने जास्त खारं.
तस लोणार हे ठिकाण काही पिकनीक स्पॉट नाही त्यामुळे ज्यांना खरोखरच काही वेगळ बघायचं आहे अशांनीच इथे यावं. नाहितर क्षितीजा पर्यंत पसरलेल्या सपाट जमिनीवर एक मोठ्ठा खड्डा, खड्ड्यात हिरवं शेवाळं आलेल पाणी, आणि डोक्यावर रणरणतं विदर्भातलं उन याव्यतिरीक्त इथे काही नाही. पिकनीक म्हणुन येत असाल तर स्वत: च्या खाण्यापिण्याची सोय करुनच या. कारण इथे तुम्हाला काहिही मिळणार नाही. नावाला MTDC च हॉटेल आहे पण "भिक नको पण कुत्रा आवर." अशी परिस्थिती. जेवणात अळ्या मिळाल्याचं बरेच जण सांगतात. "वाटेत हवं तर कुठेतरी ढाब्यावर खा. तुम्ही सांगाल तिथे गाडी थांबवतो. इथे खाउ नका." अस ड्रायवरने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही हेही नको आणि तेही नको अस करून औरंगाबादला परत आल्यावरच काय ते जेवलो.
औरंगाबादहुन सकाळी ६ ला निघालो. आतापर्यंत फक्त भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेले जिल्हे प्रत्यक्षात पहात होतो. कोकणातली हिरवीगार झाडी आणि एका नजरेत न भरणारा अथांग समुद्र पहाण्याची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना ही रखरखीत गाव नवीनच होती. बातम्यामधून इथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याबद्दल नेहमीच ऐकत आलेलो. पण आज प्रत्यक्षात पाहताना मात्र कसंतरीच वाटत होतं. दूरदूरवर पसरलेल्या रखरखीत शेतात एखाददुसरं झाड. वरती उन वाढत होतं आणि खाली रखरखाट. ड्रायवरबरोबर गप्पा ही चालेल्या. त्यावरून इथल्या एकूणच परिस्थितीचा काय तो अंदाज आला.
एकेक करत जिल्हे मागे पडत होते. आम्ही ९ ला १६० कि.मी चा प्रवास करुन लोणारला पोहचलो. सुर्य डोक्यावर येण्या अगोदर जितकं बघाता येईल तितक बघायचं असं ठरवून मी आणि सौ. ने विवर उतरायला चालू केलं. विवर उतरायला खुप कठीण आहे अशी माहिती आम्ही इंटरनेट वर वाचलेली, त्यामुळे मनाची तयारी करुन गेलेलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही नाही. तरी ज्यांना कोणाला विवरात उतरायच असेल त्यांनी कॅनवासचे बुट, भरपुर पाणी, डोक झाकायला टोपी/रुमालं घेउन घालुन यावं. विवरात उतरणं आणि चढणं म्हणजे एक छोट ट्रेकच आहे.
विवर पुर्ण उतरल्यावर पुढची वाट सोपी आहे. सरोवराच्या काठावर काही जुनी देवळं आहेत. वाटेत १-२ पडकी जुनी देवळं दिसतात. आम्हाला अगोदर वाटेत एक रामचं देऊळ लागलं. देवळाच्या बाजुला अजुन एक तसच बांधकाम होत, पण त्याची बरिच पडझड झालेली. वाटेत अजुन एक दगडाचा ढिगारा दिसला. जमिनीवर मोठे मोठे दगडी खांब सांडले होते. बहुदा इथेही पुर्वी देउळ असावं. खांबावरील जुनं कोरिवकाम बघून तसं वाटलं.


आम्ही वाट सोडुन एकदम काठावरुन जाउ लागलो. सरोवरचं शेवाळ आलेल हिरव पाणी. वारा पाण्यावरुन येताना सोबत कुजकट, सडका, विचित्र खारा वास घेउन जोराने वाहत होता. आणि सरोवराकाठची जमीन आणि खडकांवर क्षारांचा पांढरा रंग चढलेला.
देवगड किल्ल्यात रहाणारी लोकं खटवी सुकत घालतात. कोळंबी / चिंगळांचा एक प्रकार. खटवी कोळंबी पेक्षा आकाराने मोठी, साधारण हाताच्या अंगठ्याएवढी जाड असते. ही खात नाहित. सुकवुन, खत बनवण्यासाठी फिश फॅक्टरिंना पाठवतात. असे सुकट पक्षांसाठी मेजवानी. गिधाडं आणि घारी हे सुकट खायला झुंबड करातात. जिकडे हे सुकट वाळत घालतात त्याच्या आसपासची जमिन, झाडंझुडप, पक्षांच्या विश्ठेने चुना लावल्यासारखी पांढरी होतात. खटवी जसजशी सुकायला लागते तसतसा तिला येणारा वास अजुन अजुन तिव्र होत जातो. दुपारी उन्ह चढली की समुद्रावरून वारा भसाभसाकरुन वहायला लगला की समुद्रावरुन येणार्या खार्या हवेचा वास, सुकलेल्या खटवीचा सडका वास, आणि गिधाडांच्या विश्ठेचा वास एकत्र होउन सगळ्या जागेत भरुन रहातो. सरोवराचा तो वास, रणरणत उन आणि पांढरे झालेले ते दगड बघुन मला क्षणभर देवगडाची आठवण झाली.
थोड्याच अंतरावर झाडांच्या जाळीतुन लाल झेंडा फडकताना दिसला. एक देऊळ दिसल, बरेच लोक येत जात होते. ते कमळजा देवीचं देऊळ होत. येणार्या लोकांच कुलदैवत होत ते. काही लोकं देवीला कौल लावत होते तर, म्हातारी माणसं विवर उतरुन आल्याने दमली होती. देवळाच्या जवळ झाडाखाली विश्रांती घेत बसली होती. नुकतच लग्न झालेले देवीच्या पाया पडायला येत होते. सौ मला हळुच म्हणाली "मुलींनी लग्ना अगोदर मुलाची कुलदैवत कुठे आहे हे पण विचारल पाहि़जे. तुझ्या कुलदैवताला असं ट्रेक करुन याव लागलं असत तर मला विचार करावा लागला असता." मी सौला एक चांगली खुन्नस दिली.


देवळाच्या बाजूला एका झाडाखाली सावलीत जरा विसावलो. तिथून सरोवराकडे पाहत असताना नकळतच त्या घटनेचा चित्रपट माझ्या मनात बनू लागाला. हजारो वर्षांपूर्वी एका भला मोठा दगड अवकाशातुन जोराने पृथ्वीच्या दिशेने येतोय. वातावरणाच्या कक्षेत आल्यावर त्याचा एक आगीचा लोळच बनला आणि अधिक वेगाने तो जमिनेकडे झेपावू लागला आणि... धडाम्म्म धुम्म!! जोरदार आवाज करत थडकला. बरीच उलथापालथ झाली असणार. काही जीवसृष्टी नाहीशी झाली असेल तर काही नवीन जन्माला आणि असेल. या घटनेचे नाही पण निदान त्या ठिकाणाचे दर्शन घेण्याच भाग्य आज मला मिळालं. भूगर्भ शास्त्राज्ञांसाठी तर अशी ठिकाण म्हणजे पंढरीच. माझ्यापुरत म्हणायचं तर ४ मार्कांच्या टिपेपेक्षाही माझ्या नजरेत कैक पटीने या ठीकाणाचं मोल वाढलेल होतं.

निळसर हिरव्या लाटांचा आवाज कानात भरत होता. गेली कित्येक वर्ष या लाटा अशाच बनत असतील किनार्याला लागून फुटत असतील. या विवराबाहेरच जग ठवूक तरी असेल का त्यांना? प्रचंड उलाथापालथी मधून तयार झालेल्या या लाटा बाहेरील जगाच्या उलथापालथीत किती दिवस टिकून राहतात हा प्रश्नच आहे.
बुलडाण्यात पावसाळ्यात नक्की किती आणि कसा पाऊस पडतो याचा मला अंदाज नाही.
तरी खबरदारी म्हणुन पावसाच्या सुरवातीला गेलं तर उत्तम. हिवाळ्यात ही जागा
अजुन जास्त सुंदर दिसेल.
लोणार सरोवरा जवळच MTDC व PWD ची रहाण्याची सोय आहे. PWD हे MTDC पेक्षा
स्वस्त आहे. मुक्काम करुन रहाणार असाल तर संध्याकाळी, सरोवरा काठी फिरायला
छान वाटेल. संध्याकाळी फोटोही चांगले येतील.
बुलडाणा जिल्ह्यात असेच काही कामानिमित्त फुफाटे फुकत असताना एक चमत्कारिक माहीती मिळाली होती, मित्र अन मी काही प्रकल्पा निमित्त ग्रामीण भागात फिरत असता खेड़ोपाडी बऱ्याच जुन्या खोडानी "सप्तर्षी मंदिर" समूहा बद्दल सांगितले होते, आम्ही तेव्हा ही मंदिरे शोधायचा खुप प्रयत्न केला होता पण वेळे अभावी राहिले, जुन्या जाणत्या मंडळीच्या अनुसार ही मंदिरे मेहेकर अन लोणार तालुक्यांत विखुरलेली ७ मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिर हे सप्तर्षी पैकी एक महान ऋषी ला डेडिकेटेड आहे, अन दरवर्षी एका विशिष्ट दिवशी आकाशातले सप्तर्षी उर्फ़ उरसा मेजर हे कांस्टेलेशन अन ही ७ मंदिरे कोइनसाइड होतात म्हणजे सप्तर्षी पैकी एक एक तारा थेट जमीनीवरच्या एक एक मंदिराच्या सभा मंडपात असलेल्या एका झरोक्यातून दिसतो असे काहीसे,म्हणजे एक एक मंदिरावर एक एक असे सात तारे सात मंदिरे आहेत, असे म्हणले जाते,
उल्कापातानंतर मानवी सभ्यता विकसित होत गेली तसे तसे ह्या परिसरात अनेको अनेक खगोलीय गमती उलगडल्या गेल्या असतील का? हे आजही (किमान माझ्यासाठी तरी) एक रहस्य आहे
या सप्तर्षी मंदिरांबद्दल ऐकले होते, पण फक्त नावच. बाकी माहिती नवीन आहे.
लोणारलाच या मुख्य सरोवरच्या जवळच अजून एक जागा आहे. एक कुंड आहे जिथे
२४ तास पाण्याची धार एका गोमुखातून येते. अगदी जवळपास कितीही दुष्काळ असला
तरीही या धारेला नेहमीच पाणी असतं. याचा उगम कुठून आहे हे अजूनही माहिते
नाही असे म्हणतात. आणी या ठिकाणचे पाणी गोड आहे.
आंतरजालावरून साभार
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
लोणारला मालेगाव होऊन तसे तासाभरात पोचता येते. मामाचा गाव म्हणुन
बऱ्याचदा चढ्या घोड्याने बघितलेला गाव इतिहासातून बघण्याचा खरा योग आता
सुमारे पंधरा वर्षांनी आला!
लोणार नगराचा पहिला संदर्भ ऋग्वेदामध्ये आला आहे. त्यातील मधुमता नावाचे
नगर हे लोणार आहे. पुराणकथेनुसार कश्यप ऋषींना १३ बायका होत्या, त्यातील
दिती नावाच्या बायकोपासून गयासूर, कोल्हासूर व लवणासूर नावाचे पुत्र झाले.
तिघांनीही शिवाची तपश्चर्या केली. त्यामुळे शिव प्रसन्न झाले व त्यांना मरण
अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये मिळेल असा वर दिला. पण अमरत्व दिले नाही. वर
मिळाल्यावर दैत्यांच्या क्रोध व क्रौर्य मुळे देवतांनी त्यांचा वध केला.!
ब्राह्मदेवाने गयासूराचा वध केला ते स्थान बिहार येथिल ब्रह्मगया ठरले तर
शंकराने कोल्हासूराचा वध केला ते कोल्हापूर किंवा रूद्रगया ठरले, आणि
विष्णूने लवणासूराचा वध केला ते लोणार !
श्रीविष्णूच्या अंगठ्याला लागलेले रक्त धुन्या करिता गंगाभोगावती अवतरल्या व
दगडावर बसून विष्णूने स्नान केले. पुढे याच भोगावती कुंडात श्रीरामाने
सुद्धा स्नान केले. युधिष्ठीरानेही येथे पित्याचे श्राद्ध केल्याचे पुराण
सांगते.
लोणार सरोवर-
लवणासूर लपून बसला ते हेच लोणार विवर. ज्यास नाभीतीर्थ, पद्मसरोवर,
तारातीर्थ, विराजतीर्थ किंवा बैरजतीर्थ असेही म्हणतात. तुलसिदास रामायणातही
याचा उल्लेख आहे. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी सन १८२३ मध्ये
या विवराची नोंद केली. तसेच ऐन-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण
यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो.
हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले
बेसॉल्ट अर्थात अग्नीजन्य खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. पन्नास हजार
वर्षांपूर्वी या सरोवराची निर्मिती मंगळा वरील अशनी आदळल्याने झाली असावी
असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर
यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला
असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळ
यानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. असो, या
विवराचा व्यास १.८ किमी तर सरोवराचा परिघ ४.८ किमी एवढा भरतो.
पॄष्ठभागापासून याची खोली १३७ मी एवढी भरते.
सरोवरातील पाणी तसे खारे आहे. त्यात मोठ्या प्रमाणात salt आहेत. पाणी
alkaline असून ph 11 पर्यंत भरते. Halomonas ,Paracoccus, Klebsiella,
Slackia, Actinopolyspora इत्यादि प्रजातीचे nitrogen fixing bacteria या
पाण्यात आढळतात. विशेष म्हणजे या पाण्यातील जीवसॄष्टी इतरत्र सापडत नाही.
पेनगंगा व पूर्णा नावाचे दोन गोड्या पाण्याचे झरे वरून वाहत सरोवरास
मिळतात. लोणारतज्ञ प्रा बुगदाने यांनी लोणारचा इतिहास बराच प्रकाशात आणला
आहे.
ऐतिहासिक दॄष्टिने पाहिल्यास समजते की लोणार मौर्य साम्राज्यात मोडत होते.
हे दक्षिण मार्गावरील मुख्य ठीकाण असल्याने त्यास दक्षिणद्वारही म्हणत.
गुप्त कालात येथे वाकाटकांचे राज्य होते. पुढे सातवाहन आणि नंतर
राष्ट्रकुटांनी येथे शासन केले. होयसाळ व यादवांनीही यात योगदान दिले.
प्रत्येक राजवटीत नवीन देवळ बनली वा जुनी घडविली गेली. ही देवळ तलावाच्या
सभोवताली व धारेजवळ आहेत. दूरदेशातून अनेक ऋषि-महात्मे तपस्येस व देव
दर्शनास येत. मात्र अल्लाउद्दिन खिल्जीच्या आक्रमनाने काही नासधूस झाली व
पुढे बहामनी, निजामशाही, मोगल या दिर्घ परकिय राजवटिंमध्ये लोणारचे
दिव्यत्व झाकोळून गेले. पुढे सन १७०० मध्ये निजामाच्या व नानासाहेब पेशवे
यांच्या कालात येथील वास्तूंना सुकाळ आला. निजामाचा दिवान राजा चंदुमल
याचेकडून मंदिराचा वहिवाट खर्च देण्यात आला. पंडित-ब्राम्हण नियुक्त झाले व
दिप-धुपाने पुनश्च येथील परिसर दरवळून उठला.
या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. सन १८५३ मध्ये,
ब्रिटिश अधिकारी कर्नल मॅकेन्झी यांच्या मते लोणारला ३२ मंदिर व १७ स्मारक,
१३ कुंड व ५ शिलालेख आहेत. यापैकी २७ मंदिर, ३ स्मारक व ७ कुंड तलावाच्या
आत व काठावर आहेत.
प्रातकाळी अगदी ६ वाजता मी मामांसोबत माझ्या पुतन्या व भाचाला घेऊन लोणार
सरोवराकडे निघालो. घाट उतरण्यापूर्वी अफाट तलावाच मोहक दृष्य टिपून घेतल.
शंकर गणेश मंदिर-
हे मंदिर रेस्ट हाऊस पासून सरोवरात उतरताना रामगयेजवळच आहे. हे मातीखाली
दाबले गेले होते. त्याच्या आत चौकोनी महादेवाची पिंडी आहे व सुंदर गणपती
आहे.
मंदिर उध्वस्त आहे. त्याजवळच रामकुंड आहे. ते पण मातीने भरले आहे व त्याचा झरा बाजूने बगीच्या कडे काढला आहे. माझ्या आईच्या मते पूर्वी या कुंडात गरम पाणी असायचे. मात्र आज तो मातीने भरलेला आहे. याच्या शेजारी आहे रामगयामंदिर-
हे मंदिर उंचभागावर तिन्ही बाजूने सज्जा असणारे आहे. त्यांच्या गर्भगॄहावर वीरासन मधील हनुमान आहे.
मंदिराच्या आत राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती निजामाच्या काळात नष्ट झाल्या आहेत. रामगयेवरून दाट झाडीतूनझपाट्याने चालतांना वाटेतच एक हातभर लांब सुस्त पहुडलेली घोरपड दिसलीन अन् मी दचकलो ! क्षणभर तिचे निरिक्षण करून विचार आला की हे काय अद्भूत अनुभवायास मिळात आहे. कधी प्राचीन सुरेख बांधणीचं देऊळ तर कधी पक्ष्यांची किलबिल, तर कधी निसर्गाचा अविष्कार..खरेच, या ब्रह्मांडात मनुष्य मात्र एक जीव आहे..!
विष्णुमंदिर-
हे मंदिर तलावाकडे नर्सरीतून जाताना डाव्या हाताने आहे या मंदिरावर
प्रत्येक स्तंभावर सुंदर शिल्प आहे.गाभार्यात मुर्ती नाही. पण सभामंडपात
स्तंभावर गणपती, कॄष्णलीला अशी सुंदर शिल्प आहेत. कमळजा देवीकडे जातांना
पुढे लागते वाघ महादेव मंदिर-
हे मंदिर मोठे असावे. पूर्व मंडपात शिरहिन गौरी शिल्प आहे. गाभाऱ्याच्या
द्वारावर शिवपरिवार कोरवलेला आहे. स्तंभावरही शिवपुराणातील कथा कोरवलेल्या
आहेत.
मोर महादेव मंदिर हे तलावाच्या शेजारी जंगलात ध्वस्तावस्थेत आहे. याच्या स्तंभावर कामशिल्प कोरलेली आहेत.
| मोर महादेव |
गाभाऱ्यात मूर्ती नाही. पण तलावाच्या सभोवताली बहुतेक शिवमंदिर असल्याने बहुदा यातही शिवलिंग असावे.
येथून तलावाच्या काठावर जाता येते.
![]() |
| Black winged stilt |
तलावातील माती लोहकण मिश्रीत आहे, ते चुंबकीय गुणधर्म दाखवतात. पहाटे
तलावावरून उडणारे विविध पक्षी मन वेधून टाकतात.
कमळजा देवीचे मंदिर-
तलावाच्या परिक्रमेत हे अधिक शाबूत व मुख्य समजले जाते. अगदि तलावाच्या काठावर वसलेले असल्याने त्याचे प्रतिबींब तलावात मोठे मोहक दिसते.
देवीचे मंदिर अष्टाकोनी असून गाभाऱ्यात स्तंभ नाहीत. हे चालुक्य कालीन असावे. त्याचा जीर्णोद्धार यादवांनी केला.
मंदिर समोर गोड्यापाण्यची एक विहिर आहे. तिला योनी कुंड, सौभाग्यतिर्थ
किंवा सासू- सूनेची विहिर म्हणतात ते खऱ्या व गोड्या पाण्यावरून.
मंदिराच्या आवारात चुंबकसूई दिशाहिन होऊन जाते.
देवीची मूर्ती बहूतकरून माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणात देवीचा उल्लेख
पद्मावती देवी असा आहे. त्यानुसार लवणासूराचा वध करण्यासाठी विष्णुसह
देवीही आली होती.
तसेच अगस्ती मुनींची पत्नी लोपामुद्राने श्रीराम वनवासात आले तेव्हा सीतेची
ओटी भरली होती. अनेक साधुसंतांनी येथे उपासना केली.एका अख्यायिकेनुसार
मेहकरच्या कंचनी महालातील राजकुमारीने देवीच्या मंदिरा समोरील
दिपस्तंभावरील दिवा महालावरून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती राजकुमारी
शिळा बनून खाली कोसळली.
येथून पुढे दाट व उंच झाडीतून चालताना मोहक असे मोरांचे कळप नजरेत भरले.
अंबरखाना मंदिर-देवीच्या मंदिराहून तलावाच्या भोवती काही अंतर चालून गेले
की हे अंबरखाना अर्थात सूर्यमंदिर लागते. येथील सूर्यमुर्ती धारेजवळील
देवीच्या मंदिरात ठेवलेली आहे. सूर्यदेवतेच्या हातात कमळ व राजदंड आहे.
शुक्राचार्य वेध शाळा-
सरोवर हे पॄथ्वीच्या नाभीशी असल्याने यास नाभीतीर्थ म्हणटले जाते. म्हणूनच
येथे प्राचीन अष्टाकोनी वेधशाळा होती. आता फक्त शिवपिंड आहे. मंदिर
यादवाकालीन बांधनीचे आहे.
| याज्ञवल्केश्वर मंदिर |
याज्ञवल्केश्वर मंदिर- हेमाडपंथी जीर्णोद्धाराचे या मंदिराचा काहीसा सभामंडप, नंदि व समोरील भव्य शिवपिंड शाबूत आहे. जवळील कुंड
बुजत आला आहे. याज्ञवल्केश्वर ऋषी हे आयुर्वेद तज्ञ होते. असे म्हणतात की, त्यांनी निर्माण केलेल्या औषध भट्टीची राख जवळच टाकली. आजही लोक अर्धडोकीचे दुखन्यावरील औषधि म्हणून येथील माती नेतात.
सीता न्हानी व कुमारेश्वर मंदिर
याज्ञवल्केश्वर मंदिराहून डोंगर चालत धारतिर्थाकडे जातांना वाटेत राष्ट्रकुट कालीन कुमारेश्वर मंदिर व शेजारी सीता न्हानी लागते.
पुराणानुसार वासुकीचे अकरा पुत्र शंकराच्या तिसऱ्या नेत्राने भस्म झाले होते. मग वासुकीने तप केले व शंकर प्रसन्न होऊन त्यांनी पुत्र जिवंत केले. तेव्हापासून यास
कुमारेश्वर मंदिर म्हणतात. मंदिराच्या समोरच एका भव्य शिळेतून गोड पाण्याची
धार उत्सर्जीत होते, ते ललीत तिर्थ. वनवासात असतांना सीतेने येथे स्नान
केले म्हणून या धारेस सीता न्हानी संबोधतात. अखंड वाहणारी ही धार
आरोग्यवर्धक आहे.
धारतिर्थ-
लवणासूराचा वध केल्यावर श्रीविष्णु चा दाह शांत करण्यासाठी गंगाभोगावती
अवतरली ते हे ठीकाण. याला विष्णुगया असेही म्हणतात. पौराणीक दॄष्ट्या ही
धार गंगेतून येते. अनंत कालापासून अनेक साधुसंतांनी येथे उपासना करून
पवित्र स्नान केले.
धारेच्या जवळील देवीच्या मंदिरात राम-लक्ष्मण सुग्रीवाच्या सेनापतीशी चर्चा
करतात, बालीला राम बाण मारत आहेत, कॄष्ण यशोदेस लोणी मागत आहे,
शिव-पार्वती, वटसावित्री अशी सुंदर शिल्प आहेत. धारेच्या वर बालविष्णूचे
मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार नागपूरकर भोसल्यांनी केला. वैज्ञानिक दॄष्ट्या
ही धार भूगर्भातून १८ किमी अंतरावरून येते.
धारेच्या जवळच ब्राह्मकुंड आहे. जेथे ब्राह्मदेवाने विष्णुच्या स्नानानंतर
रक्तरंजीत पाण्याचा कलश ठेवला असे पुराण सांगते. जवळच पापहरेश्वर व
हटकेश्वर ही मंदिरं आहेत. मात्र धारेचे पवित्र स्नान केल्यावर आम्ही थेट
निघालो मोठा मारोती मंदिराच्या जवळच असलेल्या अंबर तलावाकडे.
मोठ्या मारोती मंदिराच्या आवारात अॅटो थांबवून तेथून पायी अंबर तलावाकडे
गेलो. म्हणतात महाकाय उल्कापात होऊन त्याचा अशनी येथे आदळला व हे लहानस
सरोवर तयार झाले. मात्र मुख्य सरोवरापेक्षा हे भिन्न आहे. याच्या पाण्यात
मोठी सजीवसॄष्टी नांदते.
तलावाच्या काठावर पानकावळ्यांची (great cormorant) व बदकाची शाळाच भरलेली दिसली. एक पांढरा करकोचाही होता त्या शाळेत.
चक्रवाक किंवा ब्राह्मणी बदक (Ruddy Shelduck /Brahminy Duck) हे मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेट मधील आहेत. तेथून ही बदके
हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (२१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. विशेष म्हणजे हे जोडीने विहार करतात. तलावाहून परततांना मोठा मारोतीचे दर्शन घेतले. सन
१८४१ मध्ये कानिटकर घराण्यांतील संत पुरूषाने या मारोतीची पुजा केली. १८६५
ला निजामाचे दिवान राजा चंदूमल आले व त्यांनी कारेगाव हे गाव जहांगीर
म्हणून दिले. त्यांनी मंदिरही बांधले होते. मुर्तीचा दगड हा चुंबकीय
गुणधर्म असणारा आहे असे प्रा. बुगदाने यांचे मत आहे.
इतर मंदिर, कुंड, आश्रम-
यमतीर्थ, औदुंबरतीर्थ, सोमतीर्थ, वायुतीर्थ, अगस्तितीर्थ, गंगासागर कुंड,
दैत्यसुदान मंदिर, त्रिपुरूषाचा मठ, मोठा मारोती, राम मंदिर, दुर्गा टेकडी
हे सुद्धा पाहाण्यासारखे आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या कालातील खंडोबाचे
देऊळ धारेच्या उत्तरेला आहे.
तसेच येथे सत्चिताश्रम आहे. स्वामी सत्चिताश्रम हे स्वातंत्र्य योद्ध्ये
होते. निजाम व इंग्रज या दुहेरी राजव्यवस्थेचा फायदा घेऊन त्यांनी
स्वातंत्र्य प्रेमिंना एकत्रीत केले.
पलसिद्ध मठ, आर्य समाज, खटकेश्वर संस्थान, भगवान बाबा संस्थान, वर्धमान गोरक्षन संस्था व मुस्लीम दर्गेही आहेत.
मात्र वेळे अभावी यातील फक्त दैत्यसुदान मंदिर व शेजारील त्रिपुरूषाचा मठ तेवढे बघण्यास आम्ही निघालो.
दैत्यसुदान मंदिर-
सुदान अर्थात कर्दनकाळ ! हे अप्रतिम मंदिर बदामीचा उत्तर चालुक्य राजा
विक्रमादित्य म्हणजे विजयादित्य याने पत्नी लोकपालदेवीच्या आग्रहावरून
त्रिभूवन कीर्ती नावाच्या स्थापत्य विषारदाकडून अकराव्या शतकात बांधले. हे
मंदिर गावामध्ये उंचवट्यावर स्थित आहे.
अजोड, अप्रतिम कलाकॄती पाहून डोळे कॄत्य झाले. मंदिराच्या मंडपात अंधार
होता. त्याच्या तिन दरवाज्यातून मंद प्रकाश डोकावत होता. गाभाऱ्यात पायदळी
लवणासूरास तुडवणारे श्रीविष्णुंची मुर्ती दिव्याच्या प्रकाशात तेजस्वी
भासत होती.
म्हणतात नागपूरकर भोसल्यांनी ब्राह्मगयेला गयासूराच्या छातीवर पाय ठेवून
असलेल्या ब्राह्मदेवाच्या मुर्तीप्रमाणे श्रीविष्णूची मुर्ती पाठवली होती.
पण निजामाच्या स्वातंत्र्यासंग्रामाच्या कालात ती भग्न पावली व तिचे मौल्यवान डोळे चोरांनी पळवून नेले. गाभाऱ्यात वरील बाजूस गंधर्व आकाशात चर्चा करीत आहेत व अप्सरा नॄत्य करीत असल्याचे शिल्प आहे. मंडपात श्रीविष्णूद्वारे लवणासूर वध व गंगाभोगावती अवतरणाचे शिल्प
बघावयास मिळाते. संपूर्ण मंदिर हे विविध शिल्पांनी नटलेले आहे. ह्यात देवतांच्या प्रतिमा, कीर्तीमुख पट्टी, वराह, विष्णु-लक्ष्मी शिल्प, कुत्र्यासह भैरव, परशुराम, अंधकासूर वधातील मुंडमाळ धारक नॄत्य शंकर, इराणचा सूर्य पायात बूट व हातात कमळ व राजदंड, इराणचा राजा खुश्रो व चालुक्य राजा विजयादित्य ह्यांच्या मैत्रीचे प्रतिक शिल्प, ब्राह्मा-विष्णू-महेश, शेषनाग-विष्णू, वामन, बलराम कॄतिका रोहिणीसह अशा प्रचंड प्रतिमा पाहून ब्रह्मांड फिरून आल्यासारखं वाटल..!
शेजारीच त्रिपुरूषाचा मठ आहे. यात ब्राह्मा-विष्णू-महेश मुर्ती आहेत.
त्यातील महेशमुर्ती गायब आहे. त्याजागेवर गरूडाची मुर्ती आहे. लिळाचरित्रात
या मठाचा उल्लेख आहे. चक्रधर स्वामी या मठात राहत असत. येथून एक भूयार
तिकडे धारेजवळील पापहरेश्वर मंदिरात जाते. काय म्हणाव या भूमिस...? किती
किस्से, किती कथा...किती मोठ्ठा हा इतिहास..! अद्भूत..!
असे हे अद्भूत लोणार म्हणजे अध्यात्म, इतिहास, कला, जीव, रसायन, भौतीक,
भूगोल, खगोल अशा सर्वच शास्त्रांचा अनोखा संगम. मानव जीवनाचा संपूर्ण भार
आणि त्याचा सार.... खरेतर साक्षात्कार..!
आदि-मध्य-अंत ह्याचे दिव्य ज्ञान ब्राह्मा-विष्णू-महेश मुर्ती देतात..!
महान ऋषिंची ही तपोभूमि आम्हास आत्मकेंद्री व्हावयास सांगते. खाऱ्या
सरोवरातून अन् त्यात नांदनाऱ्या जीवातुन, अरण्यातून वाहनाऱ्या मंद
वाऱ्यातून, धारेच्या पवित्र पाण्यातून, भव्य देवळातुन अन् त्याच्या दिव्य
कथेतून...ती आम्हांस बोलून जाते...तूच तुझ्यातील दैत्य- सुदान...!!!
![]() |
| सरोवराजवळील वेडा राघू |
पून्हा मेहकर हून जातांना...
मेहकर अर्थात शारंगधराचा आशीश प्राप्त प्राचीन मेघंकर नगरी आज गोंगाट आणि गजबजाटाने वेढून गेली आहे. इतिहास मनात साठवून बसलेले पुराणपुरूष एकाकी पण साक्षि भावाने आम्हास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नेहमिच करतात. पण आम्ही आपल्या व्यस्त आणि ग्रस्त जीवनात हरखून गर्दीतुन वाट काढत आपल्या हॉर्नचा घोषा राबवत उसासे टाकत कसेतरी येथून पळ काढण्याचा यशस्वी प्रयत्न नेहमिच करतो.
असेच एक दिवस मी मालेगावहून चिखलीस जावयास निघालो. मध्यंतरी मेहकरहून जाताना मला पेनगंगेच्या काठावरील प्राचीन असे एक सुंदर पण जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत असलेले भव्य देऊळ दिसले. पेनगंगेच्या पुलावरून जाण्याआधिच डाव्या बाजूस गाडीमधून या देवळाचा घुमट नेहमिच लक्ष वेधून घेतो ते त्याच्या पुरातन नक्षिदार बांधनीने. म्हनुन नेहमिच जिज्ञासा होते. मात्र वाटल की,आता जाऊन बघावच की काय रहस्य दडलय या घुमटामागे ते !
एक लोखंडी गेट पार करून गेल्यावर मी देवळाच्या आवारात दाखल झालो. थोडी
चौकशी केली असता एक सज्जन मला येऊन भेटले. ते होते शरद लक्ष्मन गिरी, या
देवळाचे वहिवाटदार.
या देवळाबद्दल "मेघंकरचा शारंगधर" या ग्रंथातही चार-पाच ओळींपेक्षा अधिक
माहिती दिलेली नाही. मात्र शरद गिरी यांनी मला बरीच माहिती पुरवीली.
मित्रांनो, काही पुराणपुरूषांची कथा पानांवर छापली गेली नसली तरी त्यांचे जीर्ण -एकाकी पण बुलंद अस्तीत्व खुद्द काळाचे साक्षि आहे.
हे देऊळ दत्तांचे असून पुरातन असे आहे. मुर्ती प्राचीन आहे. देवळाचा परिसर
भव्य असून पूर्वी त्यास चोहोबाजूंनी भव्य तटबंदि होती. तटबंदिला भक्कम चार
बुरूजांचा आधार होता. मात्र काळाच्या ओघात तट नामशेष झाले. देऊळाच्या
उजव्या बाजूस राहाण्यासाठी एक भव्य दगडी वास्तू होती, ती आज नसून फक्त काही
दगडी नक्षिदार खांब त्याची साक्ष देतात. मात्र १६ व्या शतकात
विटा-चून्याने शेजारीच एक दुसरी मठ वास्तू बांधली गेली. ती सुद्धा बहुतांश
पडक्या अवस्थेत आहे. देवळाचे बांधकामही विट-चून्याचे आहे. त्यासाठी आवारात
एक मोठा चूनखडीचा घाना होता, त्याचे अवशेष बघावयास मिळतात.
एक पुरातन पण भरपूर पाणी असलेली दगडी बांधनिची विहीर एका बाजूस आहे. शहरात नळ योजना होणेपूर्वी गावकरी याच विहीरीचे पाणी नेत असत.
![]() |
| शिलालेख व मठाचे अवशेष |
देवळास लागून उजव्या बाजूस एक समाधि आहे. गिरींच्या मते कुणी ऋषी श्रीहरी
यांची ती असावी. तसा शिलालेख समाधिवर कोरलेला आहे. लिपि देवनागरी असून
बहुतभाग झिजला आहे. तरी "संवत्सरे शके १६४८" व "श्रीहरी ऋषी" अशी काही
कोरीव अक्षरे वाचता येतात. बाकी भाग तर्कानेच काढावा लागतो. या शकावरुन हा
शिलालेख सन १७२४ चे सुमारास निर्मीत आहे.
इतिहास म्हणतो की १६ व्या शतकात हा भाग सिंदखेडचे राजे जाधव यांच्या
अख्त्यारीत मोडत होता. मेहकर महालही त्यांच्या अख्त्यारीत होता. आणि पुरातन
राजकिय प्रथेनुसार मठांना दिवाबत्ती व इतर उत्सवकार्यासाठी तत्कालिन
राजप्रशासनाकडून खर्च भागवण्यास जहागीर वा जमीन दिली जाई. तसेच अशी जमिन या
मठालाही मिळाली होती. जवळील शोवगा येथील जमिन या देवळास सनदेत खर्चासाठी
मोईन मिळाली होती. पण कुळकायद्याने ती अाता वाहनाऱ्याकडे गेली.
शरद गिरी यांच्या मते सेवागिर महाराज हे पूर्वी या मठाचे महंत होऊन गेले.
पश्चात गणेशगिर महाराज महंत झाले. पश्चात गुरूगुलजार पुरी व नंतर शंकरगिरी
यांनी महंत म्हनुन काम पाहिले. ब्रह्मचारी महंत श्रीशंकर गिरी हे या मठाचे
शेवटचे महंत समजले जातात. पश्चात त्यांनी या मठाची वहिवाट विष्णुगिरी
नारायनगिरी यांना दिली व नंतर ते देखभालीचे काम आज श्री शरद लक्ष्मन गिरी
यांच्याकडे अाले आहे.
एक लक्षनिय बाब ही की, पूर्वी जसे मठास राज्य व्यवस्थेप्रमाणे दिवाबत्तीची
सोय केली जाई तशी सोय शासनानेही केली होती. ती किती ...तर तब्बल २९६ ₹
वार्षीक एवढी. पण गेल्या सहा वर्षांपासून तीसुद्धा बंद झाली आहे.
![]() |
| देवळातील ते भूयार व बाहेरील ती विहिर |
चून्या-वीटांचा आवाका आणि लहान-थोरांची पुष्ते अन् राजगाद्यांची घडामोड पाहिलेल्या या पुराणपुरूषाच्या अंतरंगात बहूत रहस्य दडून बसले.
येथील भूयाराप्रमाणे अशा कित्येक गोष्टी इतिहासात रहस्य बनून बेमालूम राहिल्या मनाच्या विविध कप्प्यांप्रमाणे तुमच्या नी माझ्या....!
विवरापल्ल्याडच लोणार
दिवाळीला ट्रेकक्षितिज संस्थेचे पुढील वर्षातीेल ट्रेकचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले. हिवाळ्याचे दिवस असल्याने दरवर्षीप्रमाणे एकापेक्षा एक उत्तम रेंज ट्रेकची पर्वणी मिळालेली; पण या सर्वांत लक्ष वेधून घेतले ते लोणार नावाने. बायको कामानिमित्त परदेशवारीवर असल्याने जास्त उहापोह न घडता लगेच ट्रेक लीडर अमित दादाला कळवून, ट्रेकची फी भरली. पुण्यातील पेठेतल्या आणि पेठेबाहेरील हरहुन्नरी मित्रांची सोबत मिळणार आहे हे समजल्यावर, पुणे-जालना या साधारण 300 किलोमीटरच्या बस प्रवासाची काळजी नव्हती, पण त्यातसुद्धा शिवशाही आरामबस ऐवजी लाल डब्याची तिकिटे काढून पेठकरी पेठयांनी घोळ घातलाच. पुणे-जालना प्रवासात नेहमीप्रमाणे खंडीभर टोचणी खाऊन, शेवटी परतीच्या प्रवासापुरता का होईना हा घोळ त्यानेच निस्तरला. कदाचित गाडीच्या रंग-साधरम्यामुळे मायकल शुमाकर सोबत वेगात बरोबरी करणाऱ्या चालक आणि मिश्कील वाहक यांच्या कृपेने आणि लाल डब्याच्या खडखडाटात आम्ही वेळेआधीच औरंगाबाद गाठले. औरंगाबादेत चाहावाल्याला “उकाळा” म्हणजे काय हे माहीत नसल्याने भ्रमनिराशेत त्याने बनवलेले पाणीदार हळद दूध गटकून, भर पहाटे जालन्याला पोहोचलो. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ येथील साफसफाईचा अभाव आणि गचाळपणाचा ऐकीव आणि स्वानुभव असल्याने, वाटेतील थांब्यांवर रात्री 2-3 वाजता सफाई कर्मचारी काम करताना पाहिल्यावर हलकासा सुखद धक्का बसला. नेहमीप्रमाणे ट्रेन उशिरा आल्याने मुंबईची माणसे थोडी उशिरा पोहोचली, त्यांच्यासोबत जालन्याहून केलेल्या छोटेखानी आरामबसने लोणार गाठले. पक्ष्याना भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकाशी काही घेणेदेणे नसल्याने, ते बिचारे आपल्या वेळेला निघून गेले आणि सकाळची पक्षी निरीक्षणाची संधी हुकली. पण एरव्ही ट्रेकला गेल्यावर झोपायला फक्त सपाट जमीन आणि खोळ (sleeping bag) पुराणार्या आमच्यासारख्या भटक्यांना, MTDC मधील राहण्याची सोय पाहून आणि उत्तमप्रतीचे चहा-पोहे खाऊन ; 2-4 एक्झॉटिक जातिच्या पक्ष्यानि पुढ्यात दाणे टिपल्याचे समाधान मिळाले. ट्रेकच्या गप्पा-टप्पा आणि आवरा-आवर करून आम्ही साधारण 9 वाजता लोणार विवाराच्या प्रदक्षिणेला सुरवात केली.
अशनीच्या आघातामुळे अग्निजन्य (बसाल्ट) खडकात घडलेले पृथ्वीतलावरील एकमेव विवर म्हणून लोणारची जगभरात ओळख आहे. लोणार गावातील रमेश राठोड आमच्यासोबत आपल्या 7-8 वर्षाच्या मुलासोबत माहिती सांगायला आले होते. MTDC आवाराच्या अगदी समोर असलेल्या लोणरच्या विवाराच्या कडेवरून विवाराचे विलोभनीय प्रथम दर्शन घडले आणि क्षणात सर्वांचे म्यान असलेले कॅमेरे बाहेर पडले. पण त्याच बरोबर विवाराच्या इजेक्टा ब्लॅंकेटवर बांधलेल्या काही शासकीय इमारतींचे आणि विवाराच्या कडेवारील डांबरी रस्त्याचे बांधकाम पाहून ऐतिहासिक वाराश्यानबाबत असलेल्या सरकारी अजाणतेपणाची परत जाणीव झाली.
शिरस्त्याची ओळख परेड झाल्यावर राठोड दादांनी आपली माहितीची पोतडी हळूहळू उघडायला सुरवात केली. साधारण 150 मीटर खाली उतरून आम्ही विवरात उतरलो. सरोवराच्या पृष्ठभागावरून वाहणाऱ्या खर्या वार्यात मिसळलेल्या सडक्या अंड्यासारख्या हायड्रोजन सल्फाईड (H2S) वायूच्या वासात आम्ही विवरामध्ये सरोवराची प्रदक्षिणा सुरू केली. संपूर्ण प्रदक्षिणेत दादांनी विवाराच्या परिसरात उच्च तीव्रतेच्या शॉक वेव्हमुळे खनिज संरचनेमध्ये झालेले बदल, त्यांचे स्फटिकीकरण; खडकातले चुंबकीय गुणधर्म; मॅग्नेटाईट या खनिजावर उपजीविका करणारे व चुंबकीय गुणधर्म दर्शवणारे मॅग्नेटोसोम जिवाणू; जास्त प्रथिने असणारे स्पिरुलिना जातीचे शेवाळे; क्षारयुक्त अल्कली गुणधर्माचे पाणी, पाण्यावर तरंगणारे प्युमिस दगड याची जनमानसात बर्यापैकी ज्ञात वैज्ञानिक माहिती काही प्रात्यक्षिकांसोबत सांगितली.
विवराच्या परिघावर चालताना वाळूवर उमटलेल्या बिबट्या, तरस (Hyena), कोल्हे, रानडुक्कर, हरणे, मोर यांसारख्या जंगली श्वापदांच्या पाऊलखुणाची ओळख पण राठोड दादांनी करून दिली.

तळयाच्या काठावरील भुसभुशीत वाळूत आमचा श्वापदांच्या पाउलखुणांचा धांडोळा सुरु असताना तुतारी (Sandpiper), धोबी (Wagtail), नाचरा (Fantail) खंड्या (Kingfisher), सातभाई (Babbler), टिटवी (Lapwing), ठिपकेदार होला (Spotted Dove), मैना (Starling), बालगुली (Great Tit), पाणकावळा (Cormorant), शेकट्या (Black-winged Stilt), शिंपी (Common Tailorbird), सुर्यपक्षी (Sunbird), पोपट (Parakeet), नीलकंठ (Indian Roller), काळा शराटी (Red Naped Ibis) सारखे असंख्य पक्षी किनार्यावरील चिखलात

किडे धुंडाळत किंवा तळ्याच्या काठावरील दाट रानात मधेच दर्शन देत होते. होय म्हणायला शाही बुलबुल किंवा स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher), सुवर्ण बदक (Golden Duck) आणि हुडहुद्या (Common Hoopoe) सारख्या लाजर्या पाहुण्यांनी पण आपली झलक दाखवली.
या जैवविविधतेने नटलेल्या भौगोलिक आश्चर्याचा इतिहासातील उल्लेख अगदी
ऋग्वेदापासून चालत आलेला आहे. इतिहासात येथे घडलेल्या अनेक पौराणिक तसेच
मध्ययुगीन घटनांची नोंद आहे. मध्ययुगातल्या वाकाटक, सातवाहन, राष्ट्रकूट,
चालुक्य, होयसळ सारख्या अनेक राजघराण्यांनी लोणार परिसरात उत्कृष्ट
कोरीवकाम केलेली मंदिरे बांधली. यादव काळात यातील अनेक मंदिराचा
जीर्णोद्धार झाला तसेच नवीन मंदिरांची भर पडली त्यामुळे बहुतेक मंदिरांवर
हेमाडपंथी बांधणीचा प्रभाव दिसतो. याच यादवकाळात लोणार परिसरात मराठी भाषा,
मोडी लिपी आणि कलेचा प्रसार झाला. ग्रंथसंपत्तीचे निर्माण झाले; हेच पुढे
निजामशाहीत आणि पेशवे काळातसुद्धा कायम राहिले; पण स्वराष्ट्रात कला आणि
इतिहास जीवापाड जपणाऱ्या ब्रिटिशांच्या काळात आपल्यासारख्या उपरयांच्या
प्रदेशातील लोणारची उपेक्षा झाली जी आजतागायत बर्याचअंशी कायम आहे. या
मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे पाहण्याची संधी आम्हाला लोणार सफारी दरम्यान
मिळाली. भारतीय पुरतत्व विभागाने मातीच्या ढिगर्या खालून काढलेल्या
शंकर-गणेश मंदिरात वेगळ्या धाटणिची उंच पिंड आहे. सोबतच्याच रामगया मंदिरात
सध्या मध्येच बसवलेली श्रीकृष्णाची मूर्ती आहे. विष्णु-मंदिर, वाघमहादेव
मंदिर आणि मोर मंदिर यावर अनेक सुस्थितीतील पुराण शिल्पे आहेत. यात खजुराहो
येथील प्रसिद्ध कामशिल्पांसारखी अनेक कामशिल्पे किंवा मैथुनशिल्पे देखील
आहेत.
यापुढे
थोड्या उंचीवर कमळजा देवीचे मंदिर आहे. ही देवी खानदेश, विदर्भ व
मराठवाड्यातील बर्याचश्या कुळांची कुलदैवत असल्याने, कदाचित मंदिराचा
सद्ध्यामध्येच जीर्णोद्धार झालेला आहे. या मंदिरासमोर सासू-सुनेची विहीर
आहे. 2001 साली उन्हाळ्यात लोणार सरोवर आटले होते, तेव्हा गोडे पाणी
काढण्यासाठी ही विहीर खणली गेली, पण सध्या तळ्याच्या पाण्याची पातळी
वाढलेली असल्याने या विहिरीतील पाणी खारट आहे. एरव्ही तळयाच्या काठावर जमीन
खोदल्यास मातीतून गोडे पाणी पाझरायला लागते. याची आम्ही लिटमस परीक्षा
देखील घेतली. संक्रांतीच्या आधीच्या भोगीचा दिवस असल्याने राठोड दादांनी
सर्वांसाठी साजूक तुपातला गाजर हलवा बनवून आणला होता. एव्हाना नाश्त्यानंतर
2-3 तासांची भटकंती झालेली असल्याने यापुढील अंबरखाना सूर्य मंदिरात अगदी
गोडाचे आजार असणाऱ्या वरिष्ठांसकट झटकून सर्वानी हलव्यावर आडवा हात मारला.
पुढे वाटेतील मंगला-महादेव मंदिरात अत्यंत सुबक अशी पडझड झालेल्या दगडी
खांबावरची मोराची प्रतिमा पाहून पुढे चोपडा-महादेव मंदिराशेजारी
विवाराबाहेर पाडायला प्रारंभ केला.
क्षारांची पुटे चढल्यामुळे कदाचित ही मोराची प्रतिमा जतन झाली असावी असे वाटले. येथेच खर्याखुर्या मोरने पण भर दुपारी ओझरते दर्शन दिले. वाटेत दाट जंगलात असणाऱ्या भग्नावस्थेतील महादेव मंदिरातील सुंदर शिल्पे पहात; सोबत अशनिपातात झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे निर्माण झालेली सिलिकेची भुकटी आणि त्या अनुषंगाने येणारी पुराणातील यज्ञवलकेश्वरांच्या संजीवनी प्रयोगशाळेची गोष्ट ऐकत विवाराच्या अशनी प्रवेशापाशी असलेले गोमुखी तीर्थ गाठले. या तीर्थातील झऱ्याचे पाणी 15-18 किलोमीटर दुरून सायफनिंग तंत्राने नैसर्गिकरित्या गोमुखापर्यंत येते. विवारामध्ये पुढे याच गोड्या पाण्यावर बंधारे बांधून वनखात्याने जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. प्रवासाचा आणि 4-5 तास केलेल्या विवर प्रदक्षिणेचा क्षीण घालवण्याकरता आम्ही गोमुखी तीर्थामध्ये यथेच्छ भिजून ताजेतवाने झालो.
सद्य परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे 2001 सालापर्यंत विवाराच्या आतमध्ये होणारी शेती, खाराचे व्यापार तसेच विवर परिसरात सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे. उशिरा का होईना पण हे झालेले प्रयत्न खूप स्तुत्य आहेत. एकवेळ ताजमहाल पडला तर परत बांधता येईल; पण लोणार विवारासारख्या गोष्टी इतिहासात नशिबाने घडतात. त्यामुळे यापुढे देखील हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न होणे नितांत गरजेचे आहे.
कदाचित दिवसभर डोक्यावर तळपणारा सुर्यसुद्धा आता दमल्याने मावळतीच्या
वाटेवर होता त्यामुळे जास्त वेळ न दवडता आम्ही गावात असणाऱ्या दैत्यसुदन
मंदिराकडे मार्गस्थ झालो. स्वच्छ भारतचे वारे अजून गावातील गल्ल्यांमधे न
पोहोचल्यामुळे उघड्या गटारांवरून आणि डुकरांच्या कळपामधून वाट काढत सुंदर
अश्या मंदिर परिसरात पोहोचलो. 1878 साली उत्खननात सापडलेले दैत्यसुदन मंदिर
चालुक्यांनी साधारण 13 व्या शतकात बांधले.
त्रिस्तरीय मंदिराच्या गर्भगृहात मिश्किल हास्य देत लवणासुर राक्षसाचा वध करणारी बालकृष्णाची मूर्ती खूप विलोभनीय आहे. मंदिर अंतराळाच्या छाताच्या प्रत्येक कोपऱ्यात अतिशय सुबक कोरीव काम केलेली पुराण शिल्पे आहेत. ही शिल्पे बनवणार्या कारागिरांना मनोमन सलाम केल्याशिवाय मंदिरातून पाउल बाहेर पडत नाही. एरवी नजरेआड असणारी ही शिल्पे राठोड दादांनी बॅटरी च्या प्रकाशात दाखवली अन्यथा ती दिसणेसुद्धा दुरापास्त होते. मंदिरावर चहूबाजूनी एकापेक्षा एक सुंदर पुरानशिल्पे आहेत. यात वराह, आदित्य नारायण, इराणी पद्धतीचा सूर्यदेव, नरसिंह, वामनावतार, बालरामशिल्प, मैथुनशिल्पे, विष्णू-लक्ष्मी, दर्पणसुंदारी, विषकन्या, परशुराम इत्यादींचा समावेश आहे. या मंदिराशेजारी असणाऱ्या त्रिपुरुषाच्या मठात ब्रम्हा आणि विष्णू यांच्या उभ्या प्रतिमा आहेत पण महेशाची प्रतिमा पुर्वी गायब झाली आहे. अश्या पद्धतीची ब्रम्ह देवाची प्राचीन मूर्ती राजस्थानातील पुष्कर येथे आहे.

सूर्य अजून क्षितिजावर रेंगाळात असल्याने विवाराच्या कडेवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहामागे असणाऱ्या सज्जावर मावळतीचा सूर्य पाहायला गेलो. येथे दक्षिणायन समाप्तीच्या सूर्यास्ताचे विहंगम दर्शन, लोणार सरोवराच्या पार्श्वभूमीवर झाले.

हाडाचा मुंबईकर असल्याने सुर्यास्ताला चहाची तल्लफ न आली तर नवल; पण दिवसभर उन्हात भटकून आणि मचूळ पाणी पिऊन घशाला आलेली कोरड, ऊस रसाच्या डबलबारीने भागावण्यात धन्यता मानली. या वेळेपर्यंत बर्यापैकी अंधार झाल्याने अंबर तळ्याला फाटा देत चुंबकीय दगडात कोरलेला, झोपलेला मोठा मारोती पाहून राठोड दादांना अलविदा करत MTDC निवासस्थानी परतलो. अंबरतळे अशानिपातात उडून पडलेल्या तुकड्यामुळे घडलेले आहे, पण सध्या त्यात तुरीची शेती होते हे ऐकून फार वाईट वाटले. संध्याकाळी आवरा-आवर करून, मांसाहारी जेवणानंतर अंधारात विवाराच्या कडेला आकाश निरीक्षणासाठी चक्कर मारली. जंगली श्वापदांच्या वास्तव्यामुळे वनखात्याने सूर्य मावळल्यावर विवरात उतरण्यास मनाई केली आहे, त्यातच जरा थंडी जाणावल्यामुळे आम्ही निवासस्थानी परत आलो. इथे राहुलने सर्वांच्या आग्रहाखातर आपले शेकोटी पेटवण्याचे कौशल्य दाखवले; पण आदल्या रात्रीचा प्रवास, दिवसभराची भटकंती, झोपण्याची असलेली उत्तम सोय, पोटभर जेवणखाण आणि मुख्य म्हणजे ट्रेकला नेहमी घोरण्याने रात्र गाजवणाऱ्या वा जागवणाऱ्या मंडळींची दुसर्या खोलीत असलेली सोय यामुळे लवकरच शेकोटी विझवून आम्ही निद्रिस्त झालो. रात्री 2-4 ढेकूण अंगाखांद्यावर खेळल्याचे जाणवले पण त्यांची तमा न बाळगता दुसर्या दिवशी अगदी सूर्यनारायण साक्षात दिसेपर्यंत अंथरुणाची गाठ सोडली नाही.
जेवणाची जबाबदारी पाहणाऱ्या व्यक्तीने सकाळी नाश्त्याला काय हवे हे MTDC कार्यालयात कळवले होते, पण नाश्ता कधी हवा हे न कळवल्यामुळे तो मिळायला उशीर झाला, तोपर्यंत आमच्यातल्या बऱ्याच जणांनी MTDC निवासस्थानाच्या समोर असलेल्या चहाच्या टपरीवर सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांसोबत नाश्त्याची पहिली फेरी उरकून घेतली. सोबतच आदल्या दिवशी कट्टी असलेले काही मोर दर्शन देण्यासाठी जवळच मनसोक्तपणे बागडत होते.

नाश्त्यानंतर उशिराने MTDC सोडाल्यावर वाटेत लिंबी बारव पाहून आमची गाडी राजमाता जिजाबाई यांच्या सिंदखेडराजा येथील जन्मस्थानाच्या दिशेने धावू लागली.

जाधवराव पिता पुत्रांचे समाधीस्थळ खूप सुंदर असून त्यावर मुसलमानी अथवा निजामशाही बांधणीचा पगडा दिसतो. समाधीस्थळाच्या बाहेरील भिंतीवर सुंदर कलाकुसर आहे तसेच समोरच्या भागात समाधी शिल्पांचा अभ्यास करण्यासारख्या 5-6 विखुरलेल्या समाधी आहेत.
सिंदखेडराजा वरून दुपारचे जेवण आटपून आम्ही धावत पळत जालन्यापासून 40 किलोमीटर अंतरावरील रोहिलगड हा आडवाटेवरचा किल्ला पाहण्यासाठी आलो. परतीच्या प्रवासासाठी घड्याळाच्या काट्यासोबत शर्यत असताना पोलिस भरती परीक्षांसाठी डोंगर-दर्यात शारीरिक कसोटीची तयारी करणारा रोहिलगडचा रहिवासि, विठ्ठल वैद्य अगदी विठ्ठलासारखा भेटला. किल्ल्यावरील दगडात कोरलेल्या गुहा, खांबटाकी, रांजण पाहून विठ्ठलचा निरोप घेऊन आम्ही आरामबसने हसत-खिदळत, गाणी गात जालन्याला पोहोचलो. जालना रेल्वे स्थानकात मुंबईकरांना निरोप देऊन, रात्रीचे जेवणखाण उरकून शिवशाहीे बसने पुण्याला मार्गस्थ झालो.
या दोन दिवसात जालना, लोणार, सिंदखेडराजा परिसरातील अनेक सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळाली. पण या आधी महाराष्ट्रा शेजारील राज्यांमध्ये पाहिलेल्या हम्पी, जयपूर, जोधपूर सारख्या पर्यटन स्थळांचा झालेला विकास आठवून आपण किती मागे आहोत याची जाणीवपण झाली. या आडवाटेवर असलेल्या पण जगभरात नावाजलेल्या ठिकाणांचा योग्य पद्धतीने पर्यटनासाठी विकास केल्यास तसेच प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध असल्यास भटक्यांची 2-3 दिवसांची सफर सहज ठरवता येऊ शकते.
साकेश्वर मंदीर - साकेगाव
चिखलीपासून पश्चिमेस सहा मैलांवर एका छोट्या खेड्यात साकेगाव येथे हे
साकेश्वराचे एक अप्रतिम मंदिर पाहिले की दक्षिणेत आल्याचा भास होतो !
एकेकाळी या मंदिराचा विमानाचा भाग पडला होता तो पुरातत्व खात्याने पुनश्च
जसाच्या तसा दगडामध्ये बांधून काढला. आता त्याच्या या सुंदर शिखरावरील
नक्षीकाम आपणास बघावयास मिळते. हे मंदिर यादवांच्या काळातील असावे असे
वाटते, पण राष्ट्रकूट आणि चालुक्यांची ही राजवट विदर्भात होती म्हणून नक्की
काही सांगता येत नाही. असो,
मंदिराचे शिखर भव्य आणि उंच असून नक्षीदार आहे. त्यावर अनेक लहान-लहान मंदिराच्या शिखर आकृती कोरलेल्या आहेत.
शुक्र नाशिकवर दर्शनी बाजूस भूज नटेश असून त्याच्या खाली तीन शिल्पपटात
अनुक्रमे ब्रह्मा-सरस्वती शिवपार्वती व विष्णुलक्ष्मी आहेत तसेच
दक्षिणोत्तर भागावर सरस्वती इंद्र व महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा आहेत.
हे मंदिर गाभारा, अंतराळ, गूढमंडप व मुख मंडप युक्त आहे.
सध्या मंदिराच्या मुख मंडपात तीन नंदी ठेवलेले आहेत. मंडपाचे छत मुख्य अशा
चार खांबांवर व भिंतीवरील अर्ध स्तंभावर नऊ भागात विभागलेले आहे.
स्तंभ मध्याच्या खालच्या भागावर विविध आकृती कोरलेल्या आहेत. यापैकी
अंतराळाकडे जे दोन स्तंभ येतात यावर कीचक आकृती कोरलेली आहे. पैकी एक
स्त्री चतुर्भुज आहे व एक अंकुश व मोदक वगैरे हाती घेतलेला चतुर्भुज गणेश
आहे. अंतराळातून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूस समोरासमोरील
दोन्ही बाजूस कोष्टकामध्ये कोरलेल्या देव गणेश व कुबेर या देवतांच्या
प्रतिमा दिसतात.
गाभार्याच्या दारावरील शाखांवर प्रतिहरी, मांगल्य, विहग व घट्टपल्लव वगैरे आढळतात.
गाभारा सभामंडपापेक्षा चार फूट खोल आहे. तीन पायऱ्या उतरून गेल्यावर
गाभार्यात स्थायिक असलेली शिवपिंडी नजरेत दिसते. मानवास आदि मध्य आणि
अंताचे ज्ञान देणारा हा ईश्वर पाहिल्यावर ब्रम्हांड दर्शन होते. आणि
साकेश्वराच्या मंदिराचे सुरेख नक्षीकाम बघितल्यावर माणसाच्या कल्पकतेची
जाणीव होऊन जाते. त्यावर पडलेल्या आघातांमुळे क्षीण झालेल्या देव
प्रतिमांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्यातील देव अन् दानव दोन्ही दिसू
लागतो...!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
बुलढाणा जिल्हा माहिती
*माहिती जिल्ह्यांची*
*बुलढाणा जिल्हा*
*भाग 10*
दि. 25 मे 2019, शनिवार
*संकलन :- श्री. लक्ष्मण काटेकर,१६पूर.*
*बुलढाणा जिल्हा* महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
राज्य :- महाराष्ट्र (भारत)
विभागाचे नाव :- अमरावती विभाग
मुख्यालय :- बुलढाणा
*बुलढाणा जिल्ह्यातील तालुके*
खामगांव
चिखली
जळगाव
जामोद
देउळगांव राजा
नांदुरा
बुलढाणा तालुका
मलकापूर
मेहकर
मोताळा
लोणार
शेगांव
संग्रामपूर
सिंदखेड राजा
क्षेत्रफळ :- ९,६४० चौरस किमी (३,७२० चौ. मैल)
लोकसंख्या२५,८८,०३९ (२०११)
लोकसंख्या घनता२६८ प्रति चौरस किमी (६९० /चौ. मैल)
साक्षरता दर८५%
लिंग गुणोत्तर१.०१ /
लोकसभा मतदार संघ
बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ)
*भौगोलिक रचना*
बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा)
हा महाराष्ट्रराज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे
क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे.
जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
*जिल्ह्यातील पर्यटनस्थळे*
शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजीराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे
लोणार पासून ७ किमी वर पांगरा (डोले) गाव आहे. तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव चिखली ते सैलानी या रोडवर आहे.
मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते.
देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुवत्तेच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे.
सुलतानपुर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
उंद्री या गावापासुन 15 कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिध्द शिवमंदिर आहे.
*बुलढाणा जिल्ह्यातील तालुके*
1)खामगांव
खामगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
खामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार
प्रसिद्ध आहे. गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदीर फार प्राचीन आहे.
मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो.
खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच
या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुध्दा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर
आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर
महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या
जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा
भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत
2) चिखली चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना – खामगाव ह्या मार्गावर आहे
3) जळगाव जामोद
जळगाव जामोद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक
तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला
सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे
निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला
मैलगडसुद्धा आहे, जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे.
जळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध
महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला
यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात
मोठी व आठ दिवस चालणारी असते.
4)देउळगांव राजा
देउळगांव राजा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
5)नांदुरा नांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक सुंदर तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय
6)बुलढाणा तालुका
बुलढाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
7)मलकापूर
मलकापूर, कोल्हापूर जिल्हा याच्याशी गल्लत करू नका.
मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका
आहे. मलकापूर ला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे
बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.
त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.
8)मेहकर मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा
एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातीलनदी पैनगंगा वाहते.मेहकरचे जागतीक
भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतीक दर्जाची भषणास्पद आहेत.
(१)येथील बालाजींची मूर्ती.
(२)जगप्रसिध्द एकादश नरसिंहातील सहावा नरसिंह व मंदिर येथे आहे।.
(३)संतश्री बाळाभाऊ महाराज पितळे. ज्यांचा शिष्य वर्ग भारत व भारता बाहेर पसरलेला असून त्यांचे चरित्र दीय वबोधप्रद आहे.
मेहकर तालुक्यात चैत्र, श्रावण, भाद्रपद व मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये
विविध उत्सव साजरे केले जातात. तालुक्यात असलेल्या एका गढीचे खोदकाम सुरू
असताना १८८८ मध्ये येथे बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत
कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी
टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा
विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ,
सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत
घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात.. १८९२
मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने
मंदिराचे बांधकाम वाढत गेले.
शांरगधराची मूर्ती
*मेहकर शहर आणि तालुका*
मेहकर हे अजिंठ्याच्या पर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराजवळून पैनगंगा नदी वाहते. आधीच हा सुपीक भूभाग होता आणि त्यातच कोराडी, उतावळी, पेनटाकळी या सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यातील ओलीत क्षेत्रात वाढ झाली. १९०१ मध्ये मेहकर शहराची लोकसंख्या ५ हजार ३३० होती. १९८१ च्या जनगणनेनुसार ती २२ हजार ३८२ तर, आता ६० हजारावर पोहोचली आहे. जुन्या मेहकर तालुक्यात मेहकरसह लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांचा समावेश होता. आजही तिन्ही तालुक्यांची विविध खात्यांची उपविभागीय कार्यालये मेहकर शहरातच आहेत.
*इतिहास आणि धार्मिक स्थान*
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा
गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव
पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी
आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते.
महानुभाव पंथाचेभगवान चक्रधरस्वामींचा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव
व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या
लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची
तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप,
वसिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे
द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या
नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत.
मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे,
शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते
पेंढारी लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली.
ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध शिवाजीराजाचे आजोळ व जिजाबाईचे माहेर
सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले
लोणार ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी
धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती
मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात.
श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण
उल्लेख आला आहे. या मेहकरात अहिल्यादेवी होळकरांनी अन्नछत्र बांधून दिले
होते.
मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप
यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या
काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या
६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत.
मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी
विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर
शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती
उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती
पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून
वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते.
या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला
पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २
फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या
स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता
ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर
पाण्यात बुडून जाते.
मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, विठ्ठलमंदिर, गणपती मंदिर, दत्त
मंदिर, चंदनशेष मंदिर, हनुमानमंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर अशी
अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात
मशिदींची संख्याही मोठी आहे. अलबेरुनीच्या ग्रंथात,आईन-ए अकबरी या
अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की,
मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव
आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.
धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे
सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक
क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे
त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना
विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या
स्थापनेपासून १९६२ ते १९७८ असे सलग १६ वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते.
१९७२ च्या भीषण दुष्काळात साखर कारखाना उभारणीच्या काळात काम नसलेल्या
शेकडो हातांना काम देण्याचे मौलिक कार्य अण्णासाहेबांनी केले. शैक्षणिक
क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शुकदास महाराजांच्या
पुढाकाराने साकारलेला स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम येथे आहे.
विवेकानंद आश्रम हे मानव सेवेचे केंद्र आहे. आज तेथे शाळा, कृषी
महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय,
विविध वसतिगृहे, कर्णबधिर -अपंग निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ
(इंग्रजी माध्यम) व आरोग्य विषयक सेवा, धमार्थ रुग्णचिकित्सा केंद्र,
रोगनिदान शिबिरांचे आयोजन, कृषी प्रदर्शनांचे आयोजन, शेतकरी मार्गदर्शन
केंद्र, विवेकानंद वाटिका, हरिहर तीर्थक्षेत्र, इत्यादींमुळे शहराला
नंदनवनाचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र शासनाने विवेकानंद आश्रमास ब वर्ग
तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी पौष वद्य
पंचमी ते सप्तमी दरम्यान भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तिन्ही ही दिवस
नामवंत कलाकार, संगीतकार, गायक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार आपली
सेवा देतात. पौष वद्य सप्तमीला तीन लाख भाविक महाप्रसाद सेवन करतात.
*राजकीय पार्श्वभूमी*
जनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी
हुंडाबंदी, सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, हरितक्रांती, पर्यावरण या
सर्वच क्षेत्रांत अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू
व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक
क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत
त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली.
त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या
रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी
योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या
कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी
त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या
तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता
तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन
गेले. काँग्रेसचे आमदार म्हणून कै. किसनराव सांगळे यांची कारकीर्दही गाजली
पण, खऱ्या अर्थाने गाजला तो सुबोध केशव सावजी यांचा कार्यकाळ. सलग १४ वर्षे
ते आमदार होते. काही काळ ते महसूल, वस्त्रोद्योग आदी खात्यांचे
राज्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मेहकरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना
(कोराडी प्रकल्पातून) मंजूर झाली. मेहकरातील बरीच विकासकामे त्यांच्या
हातून झाली. या सर्व कालखंडात डॉ. पळसोकर, डॉ. देशमुख, माणिकचंद जैन,
नलिनीताई खडसे, शोभाताई अग्रवाल या नगराध्यक्षांनी लक्षात राहण्याजोगे काम
केले.
नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे काँग्रेसचे वर्चस्व
संपले आणि १९९५ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेचा
आमदार या मतदारसंघाला मिळाला. युतीच्या काळात युवक कल्याण पाटबंधारे
खात्याचे ते राज्यमंत्री झाले. सध्या ते बुलढाण्याचे खासदार आहेत.
मेहकरसाठी त्यांनी रस्ते, नालीबांधणी, वीज, पाणी आदी बाबींकरिता पैसा खेचून
आणला. नगराध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर
यांची कारकिर्द नियोजनबद्ध विकास कामांच्या बाबतीत लक्षणीयच ठरली. एकात्मिक
शहर विकास योजनेचा आराखडा त्यांच्या काळातच तयार होऊन शासनाकडे गेला.
त्यातील एकेक काम नंतरच्या काळात होत आहे. रामराव म्हस्के, कासमभाई गवळी,
संजय जाधव या नगराध्यक्षांनीही रस्ते विकासाच्या बाबतीत काम केले. सामाजिक व
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्य केलेले डॉ. संजय रायमूलकर
सध्या शिवसेनेचे आमदार आहेत.
शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे
रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार,
नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची
नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा
कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ
आहेत. चिखली, बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त
खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी
पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी
पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या
नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगीचा नाही. जागा मात्र
बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगिचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक
आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.
9)मोताळा मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील पर्यटनस्थळे
तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र
द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते. पिंपळगाव देवी
येथे मोठी यात्रा भरते
*10) लोणार*
लोणार सरोवर – उल्कापातामुळे घडलेले एक बुलडाणा जिल्ह्यातील सरोवर.
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे
एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद
शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे
आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व
संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.तसेच
या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे
विवरातच आहेत.आणखीन मंदिरे आहे.
लोणारचे सरोवर.
स्थान बुलढाणा,
महाराष्ट्र, भारत.
19.97667°N 76.50833°E
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ१.१३ चौ.किमीसरासरी खोली१३७ मी
भोवतालची शहरेलोणार
सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण
२०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,०००
वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.[४][५]
अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच
भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या
संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
*निर्मिती*
पूर्वी लोणार सरोवर हे _ज्वालामुखी] प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे
निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का
तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. तिथे प्लँगिओक्लेज नावाचे
खनिज सापडले आहे. हे खनिज एकतर मास्केलिनाइट मध्ये रूपांतरित झाले आहे
किंवा त्याच्यामध्ये प्लेनर डिफॉर्मेशन[मराठी शब्द सुचवा] वैशिष्ट्ये आहेत.
असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची
निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या
कोनाने आली आणि आदळली. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे.
अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नावीन अंदाज
सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.
*इतिहास पौराणिक* आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसालाविष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए- अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराणयासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. सरोवर परिसर लोनार सारोवर जवळ ७०० मि. अंतरावर छोटासा खळगी पडलेली आहे जेथे हनुमान मंदिर आहे
*धोका*
लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे तेथे सध्या अनेक धोके निर्माण झाले आहेत.
आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी अणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे .त्यामुळे तिथली दुर्मीळ जैवविविधता धोक्यात आली आहे.
अलीकडे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेही सरोवराला धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राचे आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले
आहे.[९] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये
घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या
मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य
दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी
रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही
महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील ही सात आश्चर्य निवडली गेली आहेत.
जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी
माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट् या कार्यक्रमाद्वारे
सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर,
श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री.
व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांमधून सात वंडर्सची
निवड करण्यात आली
लोणार – महाराष्ट्र राज्याच्या बुलडाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव.
रिसोड पासून साधारणपणे ३५ मैलावर मेहकर तालुक्यातील लोणार हे प्रसिद्ध गांव आहे. तहसील व मुख्यालयाचा बेरार प्रांतातील सर्वात जुन्या वसाहतींमध्ये समावेश होतो. ह्या भागातील परंपरेचा संबंध हिंदूंच्या त्रेता युगाशी जोडला जातो. स्कंध पुराणातील लवणासुराची गोष्ट असे सुचविते की तो राक्षस याच परिसरात राहून आजूबाजूच्या परिसरावर राज्य करीत असे. प्रत्यक्ष देवांशी सुद्धा दोन हात करण्याची त्याची तयारी होती. त्याचे मनसुबे लक्षात घेऊन देवांनी त्याचा नायनाट करण्याची विष्णूस विनवणी केली. विष्णूने दैत्यसुदनेचे रूप धारण कले व त्याच्या दोन बहिणींच्या आपल्या सौंदर्याने वश करून त्यांचेच साहाय्याने त्याचे स्थान शोधून काढले. अंगठ्याच्या स्पर्शाने विष्णूने त्या राक्षसाला जमिनीतून शोधून काढले. नंतर झालेल्या संघर्षातच त्याच्या राहत्या जागेतच विष्णूने त्याला त्याचे घर असलेल्या खड्ड्यातच पुरून टाकले. गावातील सरोवराच त्या राक्षसाची गुहा होती आणि दातेफळ या आग्नेयेकडे साधारणपणे ३६ मैलावर असणाऱ्या खेड्यापाशी असणारी शंकूसारखी टेकडी म्हणजे त्या गुहेचे टोक. हे टोक विष्णूने आपल्या पायाच्या अंगठ्याने उध्वस्त केले अशी मान्यता आहे. तीनही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या त्या सरोवरात आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम प्रतिबिंब दिसत असते. पाणी म्हणजे त्या राक्षसाचे रक्त व त्यातील मीठ (पाणी खारे आहे) म्हणजे त्याचे सडलेले मांस अशी मान्यता आहे. मात्र “लोणार महात्म” काही वेगळेच सांगते. ज्या सात ऋषींनी अठरा स्त्रियांशी विवाह करून देव व दैत्यांना जन्म दिला त्याचेपैकी एक असणाऱ्या काश्यप ऋषीच्या पत्नींपैकी एका पत्नीने जन्म दिलेला पाहिला राक्षस पुत्र म्हणजे लवणासुरा होय. तो पाहिला दैत्य होता. सध्याच्या लोणारच्या जागी असण्याऱ्या एका पर्वतावर लवणासुराने तप करून महादेवाला प्रसन्न केले. तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने लवणासुरा समोर प्रगट होऊन त्याचा इच्छीत वर मागण्यास सांगितले. जेव्हा लवणासुराने अमरत्वाचा वर शंकराकडे मागितला त्यावेळी तेहतीस कोटी देवांनी एका सुरात अशी वाणी केली की पाच वर्षाच्या एका बालकाकडून लवणासुराचा वध होईल. यानंतर शंकराने हिमालयात प्रस्थान केले व लवणासुराने तीनही लोक जिंकून घेऊन स्वतः इंद्राच्या सिंहासनावरून राज्य करू लागला. सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा बारमाही झरा (किंवा धार)आहे. एका आख्यायिकेनुसार एका ऋषीने बनारसला गंगते एक काडी सोडून लोणारकडे प्रस्थान केले व वेळेत पोहचून लोणारच्या धारेतून ती काडी बाहेर पाडताना दाखवले. ही धार चहू बाजूने वेगवेगळ्या हेमाडपंथी देवळांनी वेढलेली असून. झऱ्याचे पाणी एका गोमुखातून त्याखाली असणाऱ्या एका कुंडात पडते. त्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक लोक येत असतात. सरोवरा भोवती अनेक देवळे आहेत व त्यातील बहुतेक अत्यंत पडक्या अवस्थेत आहेत.धारेच्या पूर्वेकडे मंदिराच्या समूहात एक नरसिंहाचे मंदिर आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या भिंती व दारांवर मनुष्यांच्या व हत्तींच्या प्रतिमा कोरल्या आहेत. नरसिंहाचे मदिरा शेजारीच गणेशाचे सुद्धा एक मंदिर आहे. तेथे रेणुका मातेचे सुद्धा एक मंदिर आहे
लोणार अभयारण्य – बुलडाणा जिल्ह्यातील एक अभयारण्य.
लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास
अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी
उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या
पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे
नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे,
फुलपाखरे येथे दिसतात.
१) हे सरोवर १.२ किलोमीटर रुंद आहे आहे वरच्या बाजूला
२) १३७ मी खोल आहे
३)संपूर्ण मिळून लोणार सरोवर १.८ किलोमीटर रुंद आहे
४) हि एकमेव्या सरोवर आहे जय जे आग्नेय खडकात उल्कापात न्य बनलेले आहे पूर्ण पृथ्वी
५) ही एका खऱ्या पाणी असलेली सरोवर आहे
6) समुद्र सपाटी पासून उंची ४८० मी आहे
लोणारी – कोळसा आदि जळण विकण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ति.
लोणारी हे हिंदू धर्म व चालीरीती पाळणारे, पूर्वी क्षत्रिय धर्माचे पालन करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे तसेच शिव व विष्णूची आराधना करणारे लोक आहेत. मुंबई गॅझेटियरच्या नोंदीनुसार लोणारी हे मराठाजातिधारक आहेत. “प्राचीन शिलालेखात सापडतात लोणारी इतिहासाच्या पाऊलखुणा” टायटल-“जत संस्थानातील “लोणार”येथे प्राचीनकाळी खनिज मातीपासून मीठ निर्मिती….
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे कवठे महांकाळ मधील लोणारवाडी….
लोणारी जात ही माण,फलटन, खटाव भागात अगदी पूर्ण गावेच्या गावे आहेत
वळई,पानवन,खडकी ,जांभुळणी,वरकुटे ,शेणवडी, कुरणवाडी, विरळी,पर्य्नती
मनकरणवाडी इत्यादी भागातील लोक वेगवेगळे व्यवसाय करत आहेत माणदेश प्रकाशन
पानवण ,संदर्भ नुसार या समाजातील लोक ऊस तोडनी, मुंबई,वसई, रंग कामगार या
क्षेत्रात त्यांचे प्रमाण जास्त म्हणजे (६५%) आसपास आहे जत तालुक्याला
प्राचीन इतिहास आहे.शिलाहार,कलचुरी,देवगिरीचे यादव,मोगल,विजापूरची आदिलशाही
आणि शिवशाही अशा सर्व राजवटींच्या काळात जत तालुक्याला महत्त्व
होते.सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या आणि आकाराने विस्तीर्ण
असलेल्या जत तालुक्यात प्राचीन काळापासून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात.
तालुक्याचे ठिकाण असलेले जत शहर,संख, उमदी,उमराणी (प्राचीनकाळी उंबरवनी)
माडग्याळ (प्राचीन नांव माडगीहाळ), सिंगनहळ्ळी, लोणार, डफळापूर ही व अन्य
अनेक गांवे प्राचीन आहेत.सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्र व
कर्नाटकाच्या इतिहासात पराक्रमाचा ठसा उमटविणारे देवगिरीचे राजे सिंघनदेव
आणि संकमदेव यादव या तालुक्यात येऊन गेलेले आहेत.त्यांच्या नांवाने ओळखली
जाणारी सिंघनहळ्ळी व संख अशी गांवे आजही या तालुक्यात आहेत.विशेष म्हणजे
सिंघनहळ्ळी या लोणारीबहूल गावात लोणारी समाजाची लोकसंख्या ९०%च्या आसपास
आहे.तर संख व परिसरातील
गोंधळेवाडी,सोरडी,आसंगी,जाल्याळ,दरिबडची,माणिकनाळ,खंदनाळ या गावात लोणारी
समाजाची लोकसंख्या दखलपात्र आहे.तर सिंघनहळ्ळी या ऐतिहासिक गावाच्या शेजारी
लोणारवाडी(वाळेखिंडी),काशिलिंगवाडी,बागलवाडी ही अशीच लोणारीबहूल गावे
आहेत.जत ही महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि
आहे.म्हणून जत तालुक्यात हिंदू लोणारी बरोबर लिंगायत-लोणारी समाजाची
संख्याही लक्षणीय आहे. खुद्द जतमध्ये श्रीबंकेश्वर,माडग्याळमधील श्री
महादेव आणि उमराणीतील हेमलिंगेश्वर ही मंदिरे अतिप्राचीन असून तीनही ठिकाणी
प्राचीन हळेकन्नड किंवा कन्नड भाषेतील शिलालेख आहेत.त्यावरून जत
तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती
प्रतापराव गुजर यांचा पराक्रम या तालुक्याने पाहिलेला आहे.विजापूरच्या
आदिलशाहाचा सरदार बहलोलखान याच्या चतुरंग सैन्याचा प्रतापराव गुजर यांनी
उमराणीजवळ पराभव केला आणि बहलोल खान शरण आला. जतच्या डफळे घराण्याशी सुमारे
चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी
दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित
आहे.डफळे घराण्याला राव सर्जनसिंह,शामलसिंह,शार्दूलसिंह,सटवाजी अशा
पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे. उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या
डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत
सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे
यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई
यांनी १७०७ ते १७३८ सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती
सांभाळला. १७३८ साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या
चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव,रामराव,भगवंतराव व
मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई
यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना
डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव
यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची
जहागिरी दिली. पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील
अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील “लोणार”या गांवात प्राचीनकाळी
जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती.”लोणार”या गांवाचा तशा खनिज
मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती
इतिहास अभ्यासक श्री.चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या “इतिहासाची
सुवर्णपाने”या पुस्तकात केलेला आहे.माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ
ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही(२७ जानेवारी११७२,नंदन संवत्सर शके
१०९३) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा
उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे (वासुंबे ता.तासगांव) लोणार ता.जत आणि कोळनूर
या गांवाचा उल्लेख आहे.पण “लोणार”या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात १२
व्या शतकात खनिज मातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.
आजच्या “लोणार”या गांवाजवळ
महमदाबाद,पौट,बावची,हाजापूर,रड्डे,डोंगरगांव,निबोंणी ही मंगळवेढा
तालुक्यातील तर जत तालुक्यातील येळवी, खैराव, टोणेवाडी, कुणिकोणूर,
नरळेवाडी(सनमडी) ही लोणारीबहूल गांवे ५ ते २० कि.मी.च्या अंतरावर आहेत.
११व्या शतकात उल्लेख केलेल्या शिलालेखावरून लोणार परिसरातील लोणारी
लोकसंख्या असणार्या मंगळवेढा व जत या शेजारी तालुक्यातील गावातही खनिज
मातीपासून मीठ काढण्याचा व्यवसाय पारंपरिकरीत्या लोणारी लोक करीत होते.असे
अभ्यासकांचे मत आहे.स्थलांतरामुळे अथवा नैसर्गिक संकटामुळे उदरनिर्वाहासाठी
हे लोक १०-२० किलोमीटरच्या अंतरावर स्थिर झाले. या परिसरातील लोणारी
समाजातील काही बुजूर्गांशी संवाद साधला असता,”पूर्वी येथे खनिजमातीपासून
मीठ काढले जात होते,त्याला त्यांनी दुजोरा दिला”.या मीठ तयार करण्याच्या
पद्धतीबाबत विचारले असता, अनेकांनी मीठ काढण्याच्या पारंपरिक पद्धतीवरही
प्रकाशझोत टाकला. “जमिनीत चढत्या क्रमाने तीन कुंड बांधले जात,ते आतून
चुन्याने प्लॅस्टर करून गुळगुळीत केले जात.सर्वात उंच कुंडातील पाणी
नैसर्गिक उतराने अनुक्रमे खालील दोन कुंडात येण्याची व्यवस्था केलेली
असे.सर्वात उंचीवरील कुंडात खापराचे तुकडे,वाळूचे मोठे कण,कोळसा टाकलेला
असे.दोन नंबरच्या कुंडात वाळूचे बारीक कण व भुसा टाकलेला असे.सर्वात कमी
उंचीचा तळभागातील कुंड,गाळलेले खारट पाणी साठविण्यासाठी असे.क्षारयुक्त
खनिज-खारट मातीत पाणी घालून ते द्रावण ढवळून सर्वात उंच कुंडामध्ये ओतले
गेल्यावर पहिल्या दोन कुंडातून गाळून खारट पाणी शेवटच्या तिसर्या कुंडात
साठवले जाई.कडक उन्हाने बाष्पीभवन झाल्यानंतर त्यात शिल्लक राहिलेले मीठ
“लोणारी समाजातील लोक पारंपरिकरीत्या धान्याच्या बदल्यात जुन्या मापांने
विकत,हे मीठ विकण्यासाठी शक्यतो रेड्याचा वापर केला जात असे,यावरून यांना
“रेडा लोणारी”असे म्हटले जात असे. अशाच प्रकारचा एक शिलालेख
बोरगांव(ता.कवठेमहांकाळ)येथे देशिंग-तासगांव रस्त्यावरील पुरातन
शिवमंदिराजवळ आढळला.त्याची माहिती पुरातत्व विभागाला १९७१ मध्ये तत्कालीन
पाटबंधारे व वीज मंत्री वसंतदादा पाटील यांनी दिली,अशी नोंद आहे.या कोरीव
शिलालेखाच्या वरच्या बाजूस सुर्य व चंद्र यांच्या प्रतिमा आहेत.भाषा
संस्कृत व कन्नड लिपी प्राचीन हळेकन्नड आहे.चालुक्य प्रताप चक्रवर्ती जगदेव
मल्लाच्या राज्यारोहनाच्या बाराव्या वर्षी फाल्गुन शुद्ध चतुर्दशी,शुक्ल
संवत्सर,शके १०७१(म्हणजेच २०फेब्रुवारी) मध्ये बोरीग्राम (आजचे बोरगांव)
येथे बांधलेल्या मंदिरासंदर्भातही यात उल्लेख आहे.बोरगांवच्या या शिलालेखात
येथील बाजारात कापसाच्या गासड्या, मीठ, तेल, विड्याची पाने,
सुपार्या,भात, घोडे विकण्यासाठी येत होते,असे समजते.विशेषतः बोरगांव
परिसरात आठशे ते नऊशे वर्षापूर्वी “मीठ”बाजारात विकण्यासाठी येत
होते.यावरूरुन असे अनुमान काढले जाते की,त्या काळात परंपरेने व्यवसाय
करण्याची पद्धत रूढ होती.शिंपी कपडे शिवत,न्हावी केस कापत,चर्मकार चपला
तयार करत,तेली तेल विकत आणि फक्त लोणारीच मीठ विकत…यावरून आठशे ते नऊशे
वर्षापूर्वीपासून लोणारी हे पारंपरिकरीत्या मीठ बनवून विकण्याचा व्यवसाय
करत होते. विशेष म्हणजे हा शिलालेख कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांव येथील
प्राचीन शिवमंदिराजवळ सापडला.या कवठेमहांकाळ तालुक्यातील
लोणारवाडी,थबडेवाडी,विठूरायाचीवाडी,पिंपळाचीवाडी,देशिंग,मोरगांव,चाबुकस्वारवाडी,आटपाडकरवस्ती(कोंगनोळी)ही
लोणारीबहूल गांवे आहेत. लोणारवाडी हे लोणारी समाजाचा सांस्कृतिक व
ऐतिहासिक वारसा जपणारे गांव म्हणून प्रसिद्ध होते.खनिज मातीपासून मीठ तयार
करण्याच्या कुटिरोद्योगासाठी प्राचीन काळी प्रसिद्ध असणारे गांव
आहे.लोणारवाडी हे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीच्या काठी वसलेले गांव
आहे.शेकडो वर्षापूर्वी लुप्त झालेल्या “अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन” ही
जलतज्ज्ञ डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांच्या “लोकबिरादारी”च्या
मार्गदर्शनाखाली राबविलेली,महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एकमेव
लोकचळवळ झाली,हेच सूत्र कर्नाटकही वापरण्याच्या तयारीत आहे.अग्रणी नदीचा
प्रवाह महाराष्ट्रात ५५कि.मी.आणि कर्नाटकात ४० कि.मी.आहे. अग्रणी नदीच्या
खोर्यात जलसंस्कृती निर्माण होण्याची स्थिती,बेळगांव जिल्ह्यातील अथणी
तालुक्यातील खिळेगांव हे अग्रणी नदीच्या काठचे गांव लोणारवाडीपासून काही
अंतरावरच आहे.प्रख्यात जलतज्ज्ञ डाॅ.राजेंद्रसिंह राणा या जलक्रांतीतील
“क्रांतीदूता”ने ज्या लोणारवाडीला भेट देत जलसंस्कृतीची चळवळ गतिमान
करण्याचा प्रयत्न केला.लोक बिरादारीच्या माध्यमातून अग्रणी नदीला
पुनरुज्जीवन देण्यासाठी मार्गदर्शन करणार्या जलतज्ज्ञ डाॅ.राजेंद्रसिंह
राणा यांच्यामुळे “लोणारवाडी”हे लोणारीबहूल गांव आता प्रकाशझोतात आलेले
आहे. कर्नाटकातील उप्पार कम्युनिटीशी असणारे नैसर्गिक नातेसंबंध यांना अधिक
भक्कमपणे जोडणारी,अग्रणी ही एक जीवनदायिनी आहे.या अग्रणी नदीच्या काठी
प्राचीन काळापासून खनिजमातीपासून मीठ काढले जायचे,तसे “मोडे”गांवातील
जुन्या पिढीतील अनेक लोकांनी पाहिलेले आहेत.”खनिज मातीपासून मीठ तयार
करण्याचे कुंड आपण स्वतः पाहिले आहेत”,अशी माहिती लोणारवाडीतील निवृत्त
मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक श्री.नामदेव बजबळकर (गुरुजी) यांनी दिली.ते
आम्हांला ते मोड असणार्या जागा दाखविण्यास घेऊन गेले पण सद्यस्थितीत त्या
मोडांची उपयुक्तता नसल्याने ते शेतकर्यांनी मुजविले आहेत. याशिवाय अग्रणी
नदीचा वाळू उपसा करत असतानाही बहुतांश “मोडे” उकरून फेकले गेले. जत तालुका व
कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमारेषेशेजारी कर्नाटक राज्यातील
विजापूर-बेळगांव जिल्ह्यातील अथणी, उप्पारहट्टी, संगनहट्टी, ऐनापूर मोळे,
महालिंगपूर, रत्नापूर, हारनाळ,कनकनाळ,सौंदत्ती ही लोणारीबहूल गांवे
आहेत.येथे प्राचीन काळापासून खनिजमातीपासून मीठ तयार करण्याचे कुटिरोद्योग
होते.त्याचबरोबर या भागात काटेरी झुडूपे(वेडी बाभूळ) जाळून “लोणारी कोळसा”
तयार करण्याचे काम आजही मोठ्या प्रमाणात चालते.आम्ही जेव्हा हारनाळ,कनकनाळ
येथे गेलो तेव्हा एक बाब लक्षात आली की,येथील जमीन मोठ्या प्रमाणात क्षारपड
आहे.नैसर्गिक नापीक जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत.शिवाय या भागातील पाणी
अजिबात पिण्यायोग्य नाही.पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. दि ट्राईब्ज
अॅन्ड द कास्टस इन बाॅम्बे-१९२२ मध्ये एंथोव्हेन लिहितो,”लोणारी हा शब्द
यांच्या परंपरागत व्यवसायातून अर्थात मीठ तयार करण्यातून आलेला
आहे.लोणारींचा हा व्यवसाय करणारे बेळगांव जिल्ह्यात सापडतात”.याला
डाॅ.जी.एस.घुर्ये यांच्या,”कास्ट अॅन्ड रेस इन इंडिया”या शोधप्रबंधानेही
पुष्टी दिलेली आहे.याचा अर्थ बेळगांव-विजापूर जिल्ह्यातील गांवासह जत आणि
कवठेमहांकाळ तालुक्याच्या या सीमावर्ती भागात,कन्नडबहुल लोणारी गांवात मीठ
व्यवसायाचे कुटिरोद्योग मोठ्या प्रमाणात होते.विशेष म्हणजे मीठ कर लावून
बंदी घातलेल्या काळातही विजापूर व अथणी तालुक्यातील “लोणारीबहुल”गांवात
घरगुती मीठ तयार केले जात होते.(संदर्भ:सा.लोणारी जागर)
लोणारी जात
लोणारी ही एक हिंदू क्षत्रिय जात मराठा जातीशी संलग्न असून
मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातील अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर जळगाव,
जालना, धुळे, नाशिक, पुणे, वाशीम, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत,
तसेच मुंबई, बारामती, बेळगाव, बैतूल, हैदराबादसारख्या ठिकाणीसुद्धा
वास्तव्यास आहे. याशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश तसेच दक्षिणेकडील आंध्र
प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूमधेही लोणारी आढळतात. मध्य प्रदेशात बैतूल
जिल्ह्यात ते लोणारी कुणबी म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्रात या जातीला इतर मागासवर्गीय असा (ओबीसीचा) दर्जा आहे.
लोणारी ही एक उच्च जात असून गळवे आडनावाचे लोक त्यावर त्यांचा अधिकार होता
चुना व मीठ तसेच कोळसाबनवणारे मूळचे मराठे पण स्वतंत्र व्यवसाय
स्वीकारल्याने त्यांच्यात लोणारी व चुनारी असे प्रकार पडले. जातिविवेक या
ग्रंथानुसार लोणारी लोकांचे शुद्ध लोणारी, कडू लोणारी, अक्करमासे लोणारी
अशा शाखा आहेत. विविध शाखांमध्ये रोटी व्यवहार आहे, पण बेटी व्यवहार नाही.
त्यामुळे हे लोक जेवण एकत्र करू शकतात पण आपआपसात लग्न करू शकत नाहीत.
लोकसंख्या
लोणारी जातिधारकांची एकूण लोकसंख्या १९०१ सालच्या जनगणनेनुसार १९२२२ इतकी होती. त्यापैकी पुरुष ९६७२ व स्त्रिया ९५५० होत्या.
जातीचा इतिहास
मल्लाट पुरुष व आवर्त स्त्री यांच्यापासून लोणारी समाज सुरू झाला, असे
मानले जाते. लोणारी समाजाचे संस्कृतनाव “सौमिक” आणि समुद्राच्या
पाण्यापासून मीठ बनविणे हा पारंपरिक व्यवसाय असे दिसते. “मूलस्तंभ” नुसार
लोणारी हे मूळचे क्षत्रिय असून मराठा जातीपासून विभक्त झालेले आहेत.
पुण्यातील लोणारी हे मूळचे माणदेशातून म्हणजे मूलतः सातारा जिल्ह्यातील
फलटणहून स्थलांतरित झाले आहेत. काही जणांचे मानणे आहे की लोणारी हे लिंगायत
धर्माचेसुद्धा पालन करत होते कारण त्यांच्या धार्मिक विधी जंगमामार्फत
केले जात होते. लिंगायत धर्मीयांशी मिळणारा हा एक छोटासा दुवा आहे. एका
मिथकानुसार लोणारी जातीचा उल्लेख हा महाभारतातसुद्धाआलेला दिसून येतो.
“जेंव्हा विदुर धृतराष्ट्राला सल्ला देतो की हे राजन, तू माळ्यासारखा वाग.
माळी झाडे लावतो, जगवतो व त्याची फळे चाखतो, तसेच लोणारी झाडे कापतो, जाळतो
आणि कोळसा बनवतो”
(टीप : त्या काळी लोणारी जात अस्तित्वात असल्याचा तसा अजून कोणताही ठोस
पुरावा नाही, कारण लोणारी समाज हा काही शतकापासून मराठ्यांमधून स्वतंत्र
झालेले आढळतात)
लोणारी जातीत मूल जन्माला आल्यानंतर साधारण वर्षभरात धनगर त्याचे केस कापी
आणि त्या बदल्यात त्याला तांब्याचे नाणे दिले जाई. लोणारी जात पंचायत मानत
असत. समाजातील विविध तंटे बखेडे जात पंचायत सोडवीत असे. लोणार्यांमध्ये
सारख्या आडनावाच्या कुटुंबात लग्ने जुळत नाहीत.
कुलदैवत
लोणारी लोकांची विविध कुलदैवते असली तरी, मुख्यत्वे करून तुळजापूरची तुळजाभवानी आणि जेजुरीचा खंडोबातसेच सिद्धनाथ ही कुलदैवते आहेत.
लग्न समारंभ
दोन भाऊ अन्य कुटुंबातील दोन बहिणीशी लग्न करू शकतात. मुलाच्या लग्नाचे
तसे निश्चित वय ठरलेले नाही.पण आजकाल हे नियम बदलले आहेत. लग्नापूर्वी
शारीरिक संबध निषिद्ध मानले जातात. लग्नाआधी जर एखाद्या मुलीला गर्भधारणा
झाली तर तर संबंधित व्यक्तीशी तिचा विवाह लावणे हे सक्तीचे आहे. लोणारी
पुरुष एकच लग्न करू शकतो परंतु जर त्याची पत्नी विकलांग झाली किंवा
पत्नीधर्म निभावण्यास अक्षम ठरली तर तिच्या संमतीने दुसरा विवाह करू शकतो.
विवाहानंतर जन्माला आलेल्या प्रत्येक अपत्याची नोंद ठेवण्याचे काम भाट करत
असतो. भाटमार्फत सर्व जातींच्या वंशावळी लिहिण्याचे काम आजही केले जाते.
एकाच गोत्रात विवाहास परवानगी नाही.
लग्न जुळवण्याचे काम साधारणपणे चार पाच मध्यस्थांमार्फत होते.व मुलाचा पिता
हा मुलीच्या पित्याकडे तशी मागणी घालतो. ब्राम्हणाकडून लग्नाची तिथी व
लग्नविधीचे धार्मिक कार्य पार पाडले जाते. मुला-मुलीची पत्रिका बघूनच व गुण
जुळवून लग्न पक्के केले जाते. त्यासाठी सुपारी, हळद व कुंकू अशा सौभाग्य
अलंकाराने धार्मिक विधी संपन्न होतो. लग्न समारंभाची सुरुवात कुंकू लावणे
या कार्यक्रमाने सुरू होते व लग्न चिठ्ठी किंवा लग्नाची तारीख पक्की करणे
हा दुसरा कार्यक्रम असतो. त्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या
दिवशी देवकार्य म्हणजे सवाद्य देवक काढणे, त्यानंतर हळद लावणे, मग
देवकार्य अश्या प्रथा पाळल्या जातात. तसेच पाच पानांनी सीमान्तपूजन केले
जाते त्यात आंबा, जांभूळ, उंबर, रुई व शमीची पाने असतात. कन्यादान करून
वधुपिता किंवा मोठे काका हा समारंभ पूर्ण करतात त्यात आलेल्या वर्हाडींना
गोड व रुचकर पण फक्त शाकाहारी जेवण दिले जाते. लग्न लावताना वधुवरांच्या
डोक्यावर अक्षता व फुले फेकून मंगलाष्टके म्हणून, सप्तपदी, होम हवन व पूर्ण
पूजापाठ करून लग्नविधी पार पडतो. लोणारी लोकांना पुनर्विवाह तसेच घटस्फोट
सुद्धा मान्य आहे..
धर्म
लोणारी हिंदू धर्माला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनामानतात.. वारकरी वैष्णव व शैव पंथाचा अनुयायी असतो. हिंदू धर्माच्या चालीरीतींप्रमाणे लोणारी लोकांची गणपती, शंकर, विष्णू, लक्ष्मी, भवानी, विठ्ठल आदींवर श्रद्धा असते. तसेच ते नाग, गाय, घोडा, बैल आणि पिंपळ, शमी, आपटा, वड, तुळस, बेल यांना पूजतात. लोणारी हे हिंदू धर्माचा कट्टर अनुयायी असल्याने ते भागवत, रामायण, महाभारत आदी धार्मिक ग्रंथ याचे वाचन करतात. एकादशी, चतुर्थी, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार व खंडोबाचा रविवार उपवास धरतात. खंडोबा कुलदैवत असणारे लग्नविधी करण्यापूर्वी जागरण गोंधळ करतात. जावळ काढणे, कान टोचणे हे धार्मिक कार्यक्रम करतात. हे सर्व धार्मिक कार्य पौरोहित्य करणारा ब्राह्मणामार्फत केले जाते. लोणारी लोकांना विविध धार्मिक क्षेत्रांना भेटी देणे आवडते ते पंढरपूर, तुळजापूर, आळंदी येथे सहकुटुंब जात असतात.
व्यवसाय
पुरातन काळात चुना, मीठ व कोळसा बनवणारी लोणारी जात आता विविध क्षेत्रात
प्रावीण्य कमावीत आहे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, लेखक, संशोधक, उद्योजक,
तसेच प्रशासकीय सेवा, लष्करी सेवा, पोलीस दल, क्रीडा विश्व, शिक्षक,
प्राध्यापक, चित्रपट उद्योगातील विविध कामे असे सर्व क्षेत्रे आता लोणारी
जातिधारकांनी काबीज केली आहेत.
मुंबई व पुणे या सारख्या ठीकाणी ड्रायव्हर पण आहेत लहाण मोठ्या मालवाहतुक करणार्या गाडीवर
अन्न व खाणे
लोणारी तसे मुख्यत्वे शाकाहारी, पण बोकडाचे, मेंढीचे, कोंबड्याचे मटण तसेच मासे खाऊ शकतात.
अंत्यसंस्कार विधी
लोणारे जातीच्या मृत व्यक्तीचे हिंदू धर्माच्या प्रचलित पद्धतीने अंतिम संस्कार केले जातात. मृतदेहाला अग्निसंस्कार व लहान असेल तर पुरणे अशी प्रथा आहे. दहाव्या दिवशी दशक्रिया व तेराव्या दिवशी ज्ञातिबांधवांना जेवण दिले जाते.
लोणारी कोळसा – जळाऊ लाकडे धुमसवून बनणारा कोळसा.
दगडी कोळशाचे प्रकार
अँथ्रेसाइट – कडक दगडी कोळसा
लिगनाईट – मध्यम कडक दगडी कोळसा
बदामी कोळसा – ब्राउन कोल
पीट -कच्चा कोळसा
कोक – दगडी कोळशातून कोलगॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कार्बनी कोळशाला कोक म्हणतात.
इतिहास
आधुनिक वापर
कोळश्याचे ज्वलन
कोळश्याच्या वॅगन
कोळसा बुलडोझर द्वारे एकत्र करतांना
कोळसा हे एक प्रकारचे जीवाष्म इंधन आहे. जळाऊ लाकडे धुमसवून करतात त्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात, तर खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या व सापडणाऱ्या कोळशाला दगडी कोळसा म्हणतात..लोणारी कोळशाच्या भुकटीपासून बनणाऱ्या कोळशाला कांडी कोळसा म्हणतात
11)शेगांव
शेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका
आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन
महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले
जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदीर बांधले गेले असून त्याची
व्यवस्था तेथील ‘गजानन महाराज संस्थान’ पाहते. तेथील संस्थानाच्या ‘भक्त
निवास’ मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे ७०० खोल्यांची
व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील
पुरविण्यात येतात.येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या
प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे
प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण
केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे.त्याच्या विस्ताराचे काम
खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे.ते शेगांव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून
सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच ‘आनंद सागर विसावा’ येथेही भक्त
निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.
आनंद सागर, शेगांवचे प्रवेशद्वार आहे.
या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा,निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन
व्यवस्था,विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.
शेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे.शेगांवाची
लोकसंख्या ३२,८२४ आहे.महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगांवाकरी राज्य
परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व
प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.
येथील ‘कचोरी’ हा खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहे. त्यास आय एस ओ मानांकन
मिळालेले आहे. शेंगाव मधील कचोरी मोठ्या प्रमाणात लोकांना आवडलेला खाद्य
पदार्थ आहे. म्हणून त्या खाद्य पदार्थाला शेगाव कचोरी असे संबोधले जाते
12)संग्रामपूर
13) सिंदखेड राजा
सिंदखेडराजा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
जिजाबाई शहाजी भोसले
*राजमाता जिजाऊ*
जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी)
(इ.स. १५९८ – २७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे
जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव
घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी
दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाई शहाजीराजे भोसले
जिजाबाईंचा पुतळा पाचाड
पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म पौष पौर्णिमा शके १५२० इ.स. १५९८, सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यू :- २७ जून, इ.स. १६७४ जेष्ठ कृ. ९ , शके १५९६ पाचड,
रायगडचा पायथा
वडील लखुजीराव जाधव
आई :- म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती :- शहाजीराजे भोसले
संतती :-
छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले
राजघराणे :- भोसले
चलन :- होन
*भोसले व जाधवांचे वैर*
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण
झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले
जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व
जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले
शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी
भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी
रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर
घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी
संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही
प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे
जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
*अपत्ये*
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.
त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची
संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर
आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले
झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. शनिवार १७ एप्रिल १६२७ ,
प्रभव नाव संवत्सर , वैशाख शु.२ , शके १५४९ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी
शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
*मुलाचे संगोपन व राजकारभार*
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर
सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर
येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल
झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे
पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी
कोंडदेवयांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर
घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या
राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात
सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी
सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी
होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी
होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले.
जिजाबाईनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून
राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना
राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला
कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर
स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट,
आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन
लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर
बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून
स्वत: तंटे सोडवत.
*जीवन परिचय*
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची
चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी
राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकरयांना जुलमाने
बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती,
राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्म राजकारणात जिजाबाई राजांच्या
पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी
निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना
पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व
सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या
खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा
वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी
उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून
राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र
हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी
जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन
झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार
असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती
शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व
सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
*पुस्तके*
राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-
जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री – मेधा टिळेकर
जेधे शकावली
शिवभारत
जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
जिजाई : मंदा खापरे ट
गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
अग्निरेखा
चित्रपट
जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजीवरच्या चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले,
त्यांपैकी काही :-
राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक – यशवंत भालकर)
संदर्भ :- वेबसाईट, पुस्तक
*संकलन व मांडणी*
*श्री. लक्ष्मण काटेकर, १६पूर*
*7588020886*
https://laxmankatekar.wordpress.com
छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद
दि. 25 मे 2019.
शनिवार
1666 मध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज व युवराज छत्रपती संभाजी महाराज ह्या मान्यवरांना नजर कैद.
आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
महाराज आग्र्यापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर जाऊन पोहोचले.
औरंगाबादेनंतर येथे पोहोचेपर्यंत कोणताही खटकणारा प्रकार प्रवासात घडला
नाही. पण महाराजांच्या मनाला भीमानदी ओलांडल्यापासून ते थेट आग्र्यात
पोहोचेपर्यंत एकच गोष्ट सतत खटकत असली पाहिजे. जळजळीत पित्त उफाळून यावं
तशी त्यांची मनस्थिती होत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे या भूमीची आणि
भूमीपुत्रांची दुर्दशा , गुलामगिरी , लाचारी आणि तरीही मोगली तख्तापुढे
कमरेपर्यंत वाकणारी मुजरेगिरी. औरंगजेबाच्या वाढदिवसाची तारीख होती १२ मे
१६६६.
दि. १२ मे बादशाहाचा वाढदिवस उगवला. सामान्यपणे सकाळी १० चे सुमारास हा
वाढदिवसाचा कार्यक्रम आग्रा किल्ल्यात सुुरू होणार होता. म्हणजेच महाराज
आणि संभाजीराजे यांना किल्ल्यात सुमारे १० वाजता पोहोचणे जरूर होते. पण
बादशाहाने सलीमगडची गस्त सोडून रामसिंगला आणि मुखलिसखानला महाराजांच्या
स्वागतास जाण्याची अनुज्ञा दिलीच नाही. त्याला महाराजांचा एक वेगळाच नाटकी
देखावा करून घेण्याची इच्छा होती. ती म्हणजे शिवाजीराजे दरबारात उशीरा
यावेत. ते आलेले दरबाऱ्यांना जाणवावेत.तेथे महाराजांनी आणि संभाजी राजांनी
आपणास केलेले मुजरे आणि अर्पण केलेले नजराणे सर्वांस दिसावेत. शिवाजीसारखा
भयंकर माणूस तख्तापुढे कसा वाकतो याचे कौतुक लोकांनी पाहावे ही औरंगजेबाची
खरी इच्छा आणि योजना होती. त्यातून पुन्हा रस्ते चुकल्यामुळे महाराजांना
आणण्यास रामसिंगलाही उशीर झाला. अनेक घोटाळे झाले. अखेर महाराजांची वाट तरी
किती पाहायची , म्हणून निरुपायाने , स्वत:च्याच चुकीमुळे औरंगजेबाचा हा
नाटकाचा डाव फसला. दरबार संपवावा लागला. महाराज जेव्हा आग्ऱ्याच्या
किल्ल्यात प्रवेशले तेव्हा झणझणीत दुपार झाली होती. यावेळी बादशाहाचे दोन
दरबार संपले होते. पहिला दिवाण-ए- आम. दुसरा दिवाण-ए-खास. तिसरा एक दरबार
भरत असे. त्या रिवाजाप्रमाणे बादशाह घुशलखान्यात येऊन बसला. समोर
सरदारांच्या रांगा उभ्या राहिल्या.
महाराजांना घेऊन रामसिंग समोर आला. अकीलखान नावाच्या सरदाराने महाराजांना
अदबीने ‘ यावे ‘ असे म्हटले. महाराज आणि संभाजीराजे अन् सत्कार नजराण्याची
ताटे घेतलेले दोन नोकर असे औरंगजेबाच्या पुढे गेले. शाही आसनापासून महाराज
बहुदा सात- आठ फुटांवर पोहोचले. बादशाहाने त्यांच्याकडे बघितलेसुद्धा नाही.
एका शब्दानेही बोलणे , चौकशी करणे , निदान चेहऱ्यावर स्मित व्यक्त करणे हे
सुद्धा औरंगजेबाच्या विचित्र स्वभावाला यावेळी परवडले नाही. तो जपमाळ ओढीत
होता. महाराजांनी आणि संभाजीराजांनी रिवाजाप्रमाणे बादशाहास तीन वेळा
मुजरा (कुनिर्सात) केला आणि सत्कानजराण्याची ताटे बादशाहापुढे सादर केली.
बादशाह काही बोलतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती. पण तो अगदी ठप्प होता.
नंतर लगेच त्याने अकिलखानास फर्मावले की , यांना जागेवर सुपूर्द करा.
हा साराच शाही वर्तनाचा प्रकार अपमानकारक होता. पाचशे कोसावरून आपल्या
भेटीस आलेल्या एका दिलदार समशेरबहाद्दराचं कालपासून आतापर्यंत हे असं
स्वागत होत होतं. आश्चर्यच! महाराजांना समोरच्या सरदारांतील जरा मागच्या
रांगेत अकीलने नेऊन उभे केले. शंभूराजे शेजारीच. नंतर बादशाहाने एकमागोमाग
एक अशा चौघा बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत (आहेर) सुपूर्द केली. त्यात
महाराजांना अजिबात वगळले. हाही केवढा अपमान होता! त्यात पुन्हा
महाराजांच्याच पुढच्या एका रांगेत जोधपूरचा जसवंतसिंह उभा होता. अर्थातच
त्याची पाठ महाराजांकडे होती. त्यालाही मानाची खिलत देण्यात आली. याच
जसवंतसिंहाचा सिंहगडावरच्या मराठ्यांनी सपाटून पराभव केला होता. ( दि. २८
मे १६६४ ) जसवंतसिंहालाही पाठीवर जखमा झाल्या होत्या. तो सैन्यासह पळत
सुटला म्हणून बचावला. त्याचा आत्ता बादशाह महाराजांच्या देखत सत्कार करीत
होता. अन् सन्मानाचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराजांकडे पुरेपूर दुर्लक्ष
करीत होता. हा केवढा अपमान! आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले
अपमान आणि त्यातल्या त्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा
केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने
लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ‘ हा सारा
कसला प्रकार चालविला आहे ? अपमान! याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा
आहे.हे मी सहन करणार नाही ‘ आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली.
शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या
बाजूस गेले.ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची ,
तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत
असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.बादशाह मात्र
शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण
उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे.
ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव-औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून
आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत
महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला
की , ‘ महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ‘ तेव्हा महाराज एकदम म्हणाले
, ‘ तुमच्या बादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं
ते ?’मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल
प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या
छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच
त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.आपण फार
अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके
जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच
मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा
विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.
संदर्भ – शिवचरित्रमाला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
*आग्रा भेटीचे राजकारण मिर्झाराजे: एक कसलेले मुत्सद्दी*
★ आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती मुत्सद्दीपणे तोंड दिलं हे लक्षात येतं.
★ आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत
महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच
प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती
मुत्सद्दीपणे तोंड दिलं हे लक्षात येतं.
शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर राजांनी राष्ट्रबांधणी आणि राष्ट्रवृद्धी या
दोन्ही आघाडय़ा सांभाळल्या. राष्ट्रवृद्धीसाठी कोकण प्रांतात शिरले. जलमार्ग
आपल्या हातात ठेवायचे तर उत्तम जलदुर्ग हवेत म्हणून सिंधुदुर्गासारखा
जलकोट बांधायला घेतला. ‘धर्मस्य मूलमर्थ:’ या नात्याने स्वराष्ट्राचे
सुराष्ट्रात रूपांतर करायला फार मोठय़ा धनाची आवश्यकता होती. हा पैसा सुरत
लुटून प्राप्त केला.
पण शिवाजी महाराजांच्या या उद्योगांमुळे पुन्हा नवे संकट येऊ घातले होते.
राजांच्या वाढत्या सामर्थ्यांला संपवायला तशाच तुल्यबळ सरदाराच्या शोधात
औरंगजेब होता आणि त्याला तसा सरदार दिसला. राजपूत घराण्यातील कछवाह वंशाचे
जयपूर घराणे मोगलांचे पिढीजात एकनिष्ठ चाकर. अकबराने त्याचा सेनापती
मानसिंगला ‘मिर्झा’ म्हणजे राजपुत्र हा किताब दिला होता. अशा वंशातील
मिर्झाराजे वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला
गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. भले भले महावीर
शिवाजी महाराजांकडून परास्त झाल्यावर आता औरंगजेबाने मिर्झाराजांची निवड
केली. त्यांच्या विनंतीवरून औरंगजेबाने त्यांचे कैदी नगर, परिंडा अशा मोठय़ा
किल्लय़ात ठेवण्याची, दख्खनच्या खजिन्यातून हवे तितके पैसे काढायची संमती,
असे अधिकार मिर्झाराजांना दिले. चांदी, सोने, हिरे यांनी मढवलेल्या
अंबारीसह दोन हत्ती व हिऱ्याचे पदक याशिवाय स्वत:च्या अंगातील कबा व
गळ्यातील मोत्याचा कंठा आपल्या हातांनी मिर्झाराजांना दिला. हे सगळे केले
तरी मिर्झा आणि शिवाजी दोघे राजपूत असल्याने तेच एकत्र येतील या भीतीने
संशयी औरंगजेबाने आपल्या खास मर्जीतील दिलेरखान पठाणालाही मिर्झाराजांसोबत
पाठवले. शंकराचे उपासक असलेल्या मिर्झाराजांनी आपल्या यशासाठी धार्मिक आणि
तांत्रिक विधी करवून घेतले होते. अशी सगळी तयारी झाल्यावर मिर्झाराजांनी
१६६४ च्या अखेरीस दिल्ली सोडली.
कोणकोणत्या परिस्थितीत विजिगीषूने संधी करावा याविषयी विस्तृत विवेचन
‘षाडगुण्यम’ या अधिकरणात आहे. त्यातील सर्वात पहिला नियम ‘परस्माद्धीयमान:
संदधीत’। (७.१.१३) शत्रूपेक्षा दुर्बल असताना संधी करावा. मिर्झाराजांनी
राजांच्या प्रातांत सगळीकडे आपले सैन्य पेरून ठेवले. स्वराज्यात जागोजागी
त्याची जाळपोळ, लुटालूट सुरू होती. पुरंदरभोवती प्रचंड वेढा पडला होता.
राजांचे फार मोठे नुकसान होत होते. राजेही काही स्वस्थ नव्हते. मोगली
मुलुखावर छापे टाकणे, त्यांच्या सैन्यावर हल्ले करणे, रसद तोडणे, अशा
गोष्टी राजांच्या सैन्याकडूनही सुरू होत्या. शत्रूला जेरीस आणत असतानाच
राजे कालापव्यय करत होते. मुघलांना आपल्या पावसाची सवय नसल्याने त्यांचा
वेढा सैल पडेल व कोणत्याही मोठय़ा हालचाली होणार नाहीत म्हणून त्यांचे डोळे
पावसाळ्याकडे लागले होते.
शिवाय ‘संधिनैकतो विग्रहेणकतश्चेत्करयसिद्धिं पश्येज्ज्यायानपि
द्वैधीभूतस्तिष्ठेत’। (७.३.२२) म्हणजे एका बाजूला संधी व दुसऱ्या बाजूला
विग्रह करून कार्यसिद्धी होत असेल तर बलवत्तर राजानेसुद्धा द्वैधिभावाचा
अवलंब करावा असे कौटिल्याचे मत आहे. त्यानुसार राजे कधी मिर्झाराजांशी तर
कधी दिलेरखानाशी तर कधी आदिलशाहाविरुद्ध मोगलांशी संधी करू पाहात होते.
मिर्झाराजांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव राजांना होती. त्यामुळे त्यांना
आपल्याकडे वळवण्यासाठी मिर्झाराजे महाराष्ट्रात आल्याबरोबर राजांचा दूत
मिर्झाराजांना जाऊन भेटला. पुण्यात आल्यावरही राजांनी आपला दूत दोनदा
मिर्झाराजांकडे पाठवला. दोघांचेही क्षत्रियत्व, हिंदुत्व, एकाच पातळीवरचे
राजेपण अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर मिर्झाराजांना आपल्या बाजूने वळवण्याचा
प्रयत्न राजांनी केला. पण त्या कशालाच यश येत नव्हते. औरंगजेबाशी एकनिष्ठ
असलेल्या मिर्झाराजांना शिवाजीची संपूर्ण शरणागती हवी होती. मोगलांची
आदिलशाही नष्ट करण्याची आस लपलेली नव्हती. त्यामुळे राजांनी मोगलांशी सख्य
साधून आदिलशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. त्यालाही
मिर्झाराजांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यांनी राजांना स्पष्टपणे
बजावले, ‘ताऱ्यांप्रमाणे अगणित फौज तुम्हाला संपवण्यासाठी पाठवली आहे. जीव
वाचवायचा असेल तर निमूटपणे शरण येण्यातच तुमची प्रतिष्ठा आहे’.
मिर्झाराजांपुढे आपली कोणतीच मात्रा चालत नाही हे राजांच्या लक्षात आले.
आता राजांनी दोन वेगळ्या खेळी खेळल्या. त्यांनी मिर्झाराजांशी संपर्क चालू
ठेवला, त्याच वेळी दिलेरखानालाही शरणागतीचे पत्र पाठवले. दिलेरखानाला
महाराज अशा प्रकारे मिर्झाराजांशीही संधान बांधू पाहात असतील असा संशय आला व
तो संतापला, ‘हे शहाणपण राजांना आधी सुचले असते तर बरे झाले असते,’ अशा
आशयाचे पत्र त्याने राजांना पाठवले. थोडक्यात दोन्ही ठिकाणी आपली डाळ
शिजणार नाही हे राजांच्या पुरतेपणी लक्षात आले.
आता मात्र त्यांनी रघुनाथपंतांना मिर्झाराजांकडे आपला दूत म्हणून पाठवले.
पण ‘बादशाहाने मला बोलणी करण्याचा अधिकार दिला नाही, तरीसुद्धा शिवाजी
स्वत: नि:शस्त्र होऊन भेटीस आला तर बादशाहाची कृपा राजांवर व्हावी म्हणून
काही प्रयत्न करता येतील,’ असे उत्तर मिर्झाराजांनी रघुनाथपंतांना दिले.
आपल्याऐवजी आपल्या पुत्राला भेटीस पाठवून तहाची बोलणी करण्याची इच्छा
राजांनी व्यक्त केली. पण ही मागणीसुद्धा धुडकावली गेली. मिर्झाराजांना
प्रत्यक्ष शिवाजीच बिनशर्त शरण यायला हवा होता. परिस्थितीत छोटेसेसुद्धा
छिद्र पडत नव्हते. स्वराज्याचे प्रचंड नुकसान होत होते.
जेव्हा शक्तिशाली शत्रू मोठय़ा सैन्यानिशी आक्रमण करतो तेव्हा संधी कसा करावा ते कौटिल्याने सांगितले आहे –
प्रवृत्तचक्रेणाक्रान्तो राज्ञा बलवतारबल:।
संधिनोपनमेत्तूर्ण कोशदण्डात्मभूमिभि:।। (७.३.२२)
सैन्याचा उपयोग करून बलवान राजाने आक्रमण केले असता दुर्बल राजाने आपला
कोश, सैन्य, स्वत:ला अथवा भूमी देऊ करून त्वरित संधी करून शरण जावे.
संधींचे आत्ममिष, पुरुषांतर, अदृष्टपुरुष, परिक्रय, उपग्रह, सुवर्ण, कपाल
असे वेगवेगळे प्रकार अर्थशास्त्रात सांगितले आहेत (७.३.२३-३१).
मिर्झाराजांबरोबर राजांनी ‘आत्ममिष’ संधी केला. यात काही मोजक्या
सैन्यानिशी अथवा जितके सैन्य असेल तितक्यानिशी स्वत: विजिगीषूने बलवान
राजाच्या सेवेस हजर रहावे लागते. सर्व प्रयत्न थकल्यावर मिर्झाराजांच्या
इच्छेनुसार राजे स्वत: त्यांच्या भेटीला गेले.
आता स्वराज्याचे आणखी नुकसान टाळायचे असेल तर घाई करण्याची आवश्यकता
राजांना भासू लागली. रघुनाथपंतांनी पुन्हा एकदा मिर्झाराजांची भेट घेतली.
‘राजे आपल्या म्हणण्याप्रमाणे नि:शस्त्र भेटण्यास तयार आहेत. पण बोलणी
काहीही झाली तरी राजांच्या जीवितास अपाय होणार नाही,’ याचे वचन
मिर्झाराजांकडून हवे होते. बादशाहाच्या वतीने असे वचन देता येत नसेल तरी
स्वत: मिर्झाराजांनी तसे वचन दिल्यास राजे भेटीला येतील असा प्रस्ताव ठेवला
गेला. भेटीचा दिवस ठरला शके १५८७ आषाढ शुद्ध नवमी ११ जून १६६५.
राजे मिर्झाराजांच्या छावणीजवळ येऊन थांबले. पण अजूनही मिर्झाराजे राजांवर
विश्वास ठेवायला तयार नव्हते. ‘राजे सर्व किल्ले ताब्यात द्यायला तयार
असतील तरच राजांनी पुढे यावे अन्यथा तेथूनच परत जावे,’ असा निरोप पाठवला.
पण राजांनी मोगलांची चाकरी पत्करली असल्याने त्यांचे अनेक किल्ले मोगलांना
देण्याची तयारी दर्शवल्यावर मात्र मिर्झाराजाने आपल्या पथकातले खास राजपूत
हत्यारी राजांच्या रक्षणासाठी तैनात केले व त्यांच्या सुरक्षेखाली राजे
मिर्झाराजांच्या छावणीत आले.
छावणीत आल्यावर मिर्झाराजांनी राजांना सन्मानाने आपल्या जवळ बसवून घेतले.
यात राजांचा सन्मान करणे हा दृश्य हेतू असला तरी राजे बसतील तिथून
पुरंदरावर होणारे युद्ध राजांना दिसावे हा सुप्त हेतू होता. कारण अकरा
तारखेलाच बालेकिल्ल्यावर निकराची चढाई करण्याचा निर्णय घेतला गेला.
राजांच्या नजरेसमोर त्यांच्या लोकांचा नाश करवून संधीत राजांवर मानसिक दडपण
आणण्याचा प्रयत्न होता. संपूर्ण अर्थशास्त्राचा म्हणजेच राजनीतीचा हेतू
स्पष्ट करताना कौटिल्य म्हणतो,
प्रजासुखे सुखं राज्ञ: प्रजानां च हिते हितम्।
नात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां तु प्रियं हितम्।।
प्रजेच्या सुखातच राजाचे सुख व प्रजेच्या हितातच राजाचे हित असते.
राजाला स्वत:ला जे प्रिय त्यात त्याचे हित नाही, तर प्रजेला जे प्रिय त्यात
त्याचे हित आहे.
शिवाजीराजांसाठीसुद्धा त्यांचे लोक, त्यांचे हित हे अधिक महत्त्वाचे होते.
आपल्या मावळ्यांचा मृत्यू बघणे राजांना असह्य़ होत होते. म्हणून राजांनी
पुरंदर देण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेल्या
पत्रात म्हटले आहे, ‘शिवाजी येऊन भेटताच त्याने पुरंदर देऊ केला.’ मी
उत्तर दिले की, तो गड तर मोगली सेनेने घेतलेलाच आहे. एखाद्या तासात अगर
काही मिनिटांत गडकऱ्यांची कत्तल केली जाईल. जर तुला बादशाहाला गड द्यायचाच
असेल तर तुझ्याकडे इतर गड पुष्कळ आहेत’. यावर गडावरील लोकांची कत्तल होऊ
देऊ नका अशी विनंती राजांनी केली (बा. सी. बेंद्रे, श्री. छत्रपती शिवाजी
महाराज, पूर्वार्ध, पृ. ५२६).
यानंतर प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. हा तह करताना राजे स्वत: गेले असले
तरी मनसब मात्र त्यांनी संभाजीसाठी मागितली. मिर्झाराजे औरंगजेबाला शिवाजी
महाराजांचे शब्द कळवतात, ‘मी माझ्या मुलाला बादशाहाचा नोकर म्हणून पाठवितो.
त्याला पांच हजारी द्यावी. त्याच्या सरंजामार्थ त्याला कोठेही जहागिरी
दिली तरी मजला कबूल असेल. तो नेहमी चाकरीवर राहील. माझ्यासाठी म्हणाल तर
मला मनसब व चाकरीपासून दूर ठेवा. जेव्हा जेव्हा म्हणून दक्षिणेत युद्धाचे
काम येईल तेव्हा तेव्हा ते काम विनाविलंब पार पाडीन’ (उपरोक्त, पृ. ५२७ ).
अशा प्रकारे मिर्झाराजांच्या इच्छेनुसार राजांनी ‘आत्ममिष’ संधी करून
संपूर्ण शरणागती स्वीकारल्याचा आभास केला व मनसब संभाजीच्या नावे घेऊन
त्याचे ‘पुरुषांतर’ संधीत रूपांतर केले. या राजकारणाने राजांनी दोन गोष्टी
साधल्या. राष्ट्रासाठी दोन पावलं मागे येऊनसुद्धा स्वत:च्या आत्मसन्मानाला
धक्का लागू दिला नाही त्याच वेळी सह्यद्री आणि कोकणासारखा युद्धास उपयुक्त
असा स्वत:चा भूप्रदेश सोडून दूर जाता येऊ नये अशी व्यवस्था करण्याचा
प्रयत्न केला. मिर्झाराजांसारख्या कसलेल्या राजकारण्याला राजांनी पहिला
गुंगारा दिला.
#संदर्भ :- वेबसाईट, ग्रंथ संपदा.
_______________★_____________
*संकलन व मांडणी*
*श्री लक्ष्मण काटेकर, 16 पूर*
*7588020886*
https://laxman karekar.wordpress.com
प्रभुचंद्र श्रीराम यांचा मृत्यू
आपल्यापैकी किती जणांना श्रीरामांच्या मृत्युची किंवा श्रीविष्णूंच्या या रामावताराच्या समाप्तीबद्दल माहित आहे? जरूर वाचा….
प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. प्रभूंना आपले
अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही.सर्व देवचिंतातुर झाले.भगवान
विष्णूनां वैकुंठा त परतआणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे
गेले.त्याच्यावर ही कामगिरी सोपावली.परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट
नकार दिला.जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तो पर्यंत मी त्या नगरीत पाऊलही
टाकू शकत नाही असे सांगितले. शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर
सोपावली. त्याने ती मान्य केली.पण त्यालाही हनुमंता ची भीती होतीच.म्हणून
त्याने साधूचा वेष घेतला.बरोबर दुर्वास मुनींना घेतले.दोघेही अयोध्येत
आले.काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची ईच्छा प्रगट
केली.रामरायांची भेट झाली.प्रभूंनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची
विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले.लक्ष्मणा ला
दारात पहारा देण्यासाठी उभे केले.कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली.
आज्ञा मोडणार्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे
राहिले.एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती
केली.प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्युअटळ आहे या सत्याची आठवण करून
दिली.प्रभूंनी आपली विवषता बोलून दाखवली.. लक्ष्मण व हनुमंत यांच्या
भक्तीने मी बांधला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे सांगितले.
लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले.ती
जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले.तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी
विनंती केली.प्रभूंनी त्यास होकार दिला.तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे
आले.त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगीतले. लक्ष्मणा ने नकार
दिला.प्रभूंची आज्ञा सांगीतली.पण दुर्वास ऐकेनात.ते अत्यंत क्रोधीष्ट
झाले.आपली भेट नाकारणार्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू
लागले.लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले.मुनींना आत जावू द्यावे तर बंधू
आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल.नाही जावू द्यावे
तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील.शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे
जाण्याचे ठरवले.रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत
प्रवेश केला.इकडे दुर्वास गुप्त झाले.लक्ष्मणाला पहाताच रामचंद्रांनी
त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली.परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा
मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले.प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास
सांगीतले. अयोध्येच्या बाहेर तु निघून जा हाच तुला मृत्युदंड असे
सांगीतले.समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते
समजला.राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला.शरयू नदीत आपला
देह त्यागून आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या
येण्याची वाट पहात बसला.
इकडे प्रभू रामचंद्रांचाकाळाने निरोप घेतला.प्रभू खोलीच्या बाहेर
आले.त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक
छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली.हनुमंताला बोलावून आणण्याची
आज्ञा केली. हनुमंत आले.प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे
सांगीतले.हनुमान अंगठी काढू लागले.पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी
निघेणा.मग हनुमंताने सुक्ष्मरूप घेतले व त्या फटीत गेले.पण ती फट म्हणजे एक
सुरंग होता.त्या फटीतुन हनुमंत थेट पाताळात गेले.
इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणांस सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू मध्ये
जातो असे सर्वांना सांगीतले.प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता आडवू
लागले.प्रभू मात्र कोणाचे ऐकेणात.शेष त्यांची वाट पाहत होता..प्रभू शरयू
तीरावर आले.सर्व प्रजाही बरोबर आली.ज्या मार्गाने लक्ष्मण जी गेले त्याच
मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले.इकडे हनुमंत
पाताळात पोहोचले. वासूकी ने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले.
प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगीतले.वासूकीने
त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेवून जा असे
सांगीतले.परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या.सर्व रामरायांच्याच
होत्या.त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला.तेव्हा खरी गोष्ट
वासुकींनी त्यांना सांगीतली.
आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत, हे ऐकून मारूतीराय मनोवेगाने शरयू
तीरावर आले.सर्व प्रजाजन शोक करीत होते. मारुतीरायांनाही अनावर असा शोक
झाला.त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली.तेव्हा शरयूतुन शेषावर
पहूडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले.सर्वांना आनंद झाला.सर्वांनी भगवंताचे
दर्शन घेतले.आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू
नका असे सांगीतले. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे
राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशिर्वाद
दिला.हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या
चिरंजीवीत्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या
वर दिली.सर्वांचा निरोप घेवून प्रभूंनी वैकुंठाला गमन केले.
व्हिक्टोरिया राणी जन्मदिन
दि.:- 24 मे 2019,
वार :- शुक्रवार.
===========★===========
*व्हिक्टोरिया राणी जन्मदिन*
*(अलेक्झांड्रिना) व्हिक्टोरिया:-*
*जन्म दिनांक :-* २४ मे १८१९,
*मृत्य दिनांक :-* २२ जाने, १९०१.
राणी व्हिक्टोरिया ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती व ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती. ती इ.स. १८३७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली. ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्वह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो. इ.स. १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला. त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा ‘राणीचा जाहिरनामा’ म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानची सम्राज्ञी असा पुढे तिने किताब ही धारण केला.
*युनायटेड किंग्डमची राणी*
*कार्यकाळ*
दि. २० जून १८३७ ते दि. २२ जानेवारी १९०१ पंतप्रधान म्हणून राहिली.
*भारताची सम्राज्ञी*
*कार्यकाळ :-*
दि. १ मे १८७६ ते दि. २२ जानेवारी १९०१,
*पती :-* साक्से-कोबर्ग व गोथाचा,
*राजपुत्र :-* आल्बर्ट
*अपत्ये :-* ९ होती.
व्हिक्टोरिया ही राजा तिसरा जॉर्ज ह्याची नात होती.
*ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र*
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of
Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स.
१८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट
ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
United Kingdom of Great Britain and Ireland
*इ.स. १८०१ – इ.स. १९२२*
*ब्रीदवाक्य:-* Dieu et mon droit (फ्रेंच) “देव आणि माझा अधिकार”
*राजधानी :-* लंडन
*अधिकृत भाषा :-* इंग्लिश
*क्षेत्रफळ :-* ३,१५,०९३ चौ. किमी
*लोकसंख्या :-* ४,२७,६९,१९६ (१९११)
घनता :- १३५.७ प्रती चौ. किमी
विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या
स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डममधून बाहेर पडण्याचा
निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश
वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे
स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे
प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला. आयर्लंड वेगळा झाल्यानंतर
इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून
ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड
किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.
*राणीचा जाहीरनामा (१८५८):-*
अठराशे सत्तावनचा उठाव शमल्यानंतर हिंदुस्थानातील प्रजेला उद्देशून
इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने काढलेला जाहीरनामा. १८५८ च्या गव्हर्मेंट
ऑफ इंडिया या अधिनियमानुसार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला. या
जाहीरनाम्याने हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून
इंग्लंडच्या राणीकडे (ब्रिटिश शासनाकडे) विधिवत सुपूर्त करण्यात आला आणि
१६०० पासून १८५८ पर्यंत या कंपनीने कमावलेले हिंदुस्थानचे साम्राज्य
इंग्लंडच्या आधिपत्याखाली आले.
जाहीरनाम्यातील उद्देश परिपूर्तीसाठी परमेश्वराने इंग्रजांना सामर्थ्य
द्यावे, असे जाहीरनाम्यावर सही करताना राणीने स्वहस्ताने लिहिले होते.
⇨ लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंगने अलाहाबाद येथे १ नोव्हेंबर १८५८ रोजी दरबार
भरवून या जाहीरनाम्याचे निवेदन केले. जाहीरनाम्याच्या प्रती
संस्थानिकांकडेही पाठविण्यात आल्या होत्या. जाहीरनाम्यातील काही
महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे होत्या :
हिंदुस्थानवर राज्य करण्याचा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार ब्रिटिश शासनाने
घेतला. हिंदी संस्थानिकांबरोबर कंपनी सरकारने केलेले करारमदार पाळले जातील
आणि त्यांना इभ्रतीने वागविले जाईल. प्रजेच्या धार्मिक बाबी व चालीरीती
पूर्ववत चालू राहतील.काळा-गोरा असा भेद न करता शासनात यापुढे पात्रतेनुसार
नोकरी दिली जाईल. अपराधी नसणाऱ्या कैद्यांना क्षमा करण्यात येईल.हिंदी
प्रजेची जमिनीवरील निष्ठा लक्षात घेऊन त्या वंशपरंपरागत त्यांच्याकडे
राहतील. संस्थानिकांना दत्तक घेण्यास संमती देण्यात येईल. प्रजेचे कल्याण
करणे, हेच यापुढे शासनाचे ध्येय राहील. या जाहीरनाम्यामुळे हिंदुस्थानातील
कंपनीच्या कारभाराचे उच्चाटन करण्याचा ब्रिटिश शासनाचा हेतू सफळ झाला. तसा
ब्रिटिश शासनाने भारताचा राज्यकारभार वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच बराचसा
प्रत्यक्षपणे सुरू केला होता; परंतु तरीही जी थोडीबहुत कंपनीची अडचण
व्हायची ती एकदा कायमची संपली. गव्हर्नर जनरल यास राजाचा प्रतिनिधी म्हणून
व्हाइसरॉय हा किताब मिळाला.
१८३३ पासून कंपनीच्या भागीदारांच्या भांडवलावर १०·५% व्याज हिंदुस्थानच्या
तिजोरीतून देण्यात येत असे. कंपनी संपुष्टात आल्यानंतर ती भांडवलाची रक्कम
हिंदुस्थानच्या राष्ट्रीय कर्जात जमा होऊन तो बोजा तेथील शासनावर लादण्यात
आला. १८५७ च्या उठावाला स्वातंत्रयुद्ध म्हणावे की नाही, हा प्रश्न अजूनही
विवाद्याच आहे; तथापि भारतातील कोणत्याही गटाला दुखावून तेथे आपली सत्ता
कायम ठेवणे अवघड जाईल, ह्याची इंग्लंडच्या सरकारला झालेली जाणीव मात्र ह्या
जाहीरनाम्यावरून स्पष्ट दिसते.
आपल्या धर्मात ढवळाढवळ होणार नाही, आपल्याला सक्तीने ख्रिस्ती केले जाणार
नाही, ह्याचा दिलासा मिळाल्यामुळे सर्वसामान्य श्रद्धाळू जनतेला हायसे
वाटले. भारतातील रयतेचा संतोष आणि ब्रिटिश शासनाची भारतावर राज्य करण्याची
अधिक परिणामकारक व्यवस्था, अशा दोन्ही दृष्टींनी ह्या जाहीरनाम्याला
ऐतिहासिक महत्त्व आहे. [इंग्रजी अंमल; भारतीय संविधान].
_______________________________
*संकलन & मांडणी*
*श्री.लक्ष्मण काटेकर, 16पूर*
*7588020886*
https://laxmankatekar.wordpress.com
शिवनिती
जागतिक कुर्म ( कासव ) दिन
दिनांक :- 23 मे 2019
*जागतिक कुर्म ( कासव ) दिन
कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.
*कासवांचे प्रकार*
1) जमिनीवरील कासव
याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे असतात.
2) गोड्या पाण्यातील कासव
ही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप
मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात.हि कासवे
जमिनीवर हि राहू शकतात.
3) समुद्री कासव
समुद्रात राहणार्या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही
कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या
कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची
कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री
किनार्यावर आढळून येतात.
ऑलिव्ह रिडले कासव – हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे
एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी
घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात
ओडिशाच्या गोहिरमाथा समुद्र-किनार्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात.
ही कासवे भारताच्या इतर किनार्यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी
शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी
आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. कोकण
किनार्यावरही ही कासवे आढळून येतात.
हिरवे कासव (ग्रीन टर्टल) – या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक
असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने
डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनार्यावर यांचा
आढळ आहे.
चोच कासव – (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो.
त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे.
आपली घरटी ही कासवे एकान्त असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. स्पंज,
माखले, झिंगे हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ अंदमान आणि निकोबार,
निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर आहे.
चामडी पाठीचे कासव – (लेदर बॅक टर्टल) – समुद्री कासवांमधील यांचा आकार
सर्वांत मोठा असतो. यांची जास्तीतजास्त लांबी १७० सें.मी. आढळली आहे व वजन
५०० किलोग्रॅम. या कासवाची पाठ एका पातळ मऊ आवरणाने आच्छादलेली असते. यांचा
जबडा नाजूक कात्रीसारखा असतो. जेली फिश हे यांचे आवडते खाद्य आहे. भारतात
यांचा आढळ अंदमान आणि निकोबारआणि लक्षदीप बेटांवर आहे.
तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू,
मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर,
अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या
सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या
प्राणिसंवर्धन अणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना
पकडणे बेकायदेशीर आहे.
संवर्धन
फेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्नागिरी येथे ‘समुद्री कासव महोत्सव’
साजरा केला जातो. यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासवाच्या
पिलांच्या जन्माचा व त्यांचा समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी
असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे प्रजनन व संवर्धन केंद्र आहे.
आंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटी.
*सांस्कृतिक महत्व*
भारतीय संस्कृतीमधील कासव हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी
आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक
दृष्ट्या विशेष स्थान आहे. …. पुराणातील अख्यायिकांनुसार कूर्म अवतार हा
विष्णूचा कासव रुपातील अवतार समजला जातो. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग
आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो.
कासवाचा आकार त्याची शरीर वैशिष्ट्ये यांचा कुशल उपयोग आपण पुराकथांमध्ये
पाहू शकतो. वेद ग्रंथांपासून पुराणकथांपर्यंत व बडबड गीतांपासून ते
तत्वज्ञानापर्यंत कासवाचा संचार आहे.भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले
कासव हेही असेच महतत्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे कि कासव जसे बाह्य
गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट .मान कवच्यामध्ये
ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम,क्रोध,मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी
दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
कासव पाळीव प्राणी म्हणूनही पाळलेले अथवा आहारातही प्रयोजन केलेले दिसते,
काही देशात पालीव प्राणी अथवा आहार प्रयोजना बद्दल निर्बंधही आहेत.
फेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात कासवाची उपस्थिती शुभ व लाभकारी मानली जाते.
कासव मनात शांती आणि जीवनात धन आणण्यात मदत करतं. फेंगशुईप्रमाणे घरात कासव
ठेवल्याने घरातील सदस्यांचे वय वाढतं आणि सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून
घरात आणि ऑफिसमध्ये कासव ठेवणे शुभ मानले गेले आहेत. फेंगशुई नियमांप्रमाणे
कासव कधीही बेडरूममध्ये ठेवू नये. कासवासाठी सर्वांत योग्य ठिकाण घरातील
बैठक अर्थात ड्राइंग रूम आहे. केवळ शोभा वाढवण्यासाठी दोन कासव ठेवू नये.
दोन कासव ठेवल्याने फायद्यात बाधा येते. कासवासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर
आहे. उत्तर ही धनाची दिशा मानली गेली आहे. उत्तर या दिशे व्यतिरिक्त
पूर्वीकडेही कासव ठेवू शकतो. कासवाचा चेहरा घरातील आतल्या बाजूला असावा.
बाहेरच्या बाजूला तोंड असल्यास ज्या गतीने पैसा घरात येतो त्याच गतीने
खर्चही होऊन जातो. कासवाला एखाद्या पॉटमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे. सात
धातूने निर्मित कासव वास्तू दोष दूर करतं आणि याची पूजा केली जाते. याने
घरात शांती आणि सद्भावाचे वातावरण राहतं. कासव दक्षिण-पूर्व दिशेत ठेवावे.
कासवाच्या पाठीवर सात धातूने निर्मित सर्व सिद्धी यंत्र साहस व समृद्धी
प्रदान करतं.मंदिरात कासव असण्याचे महत्त्व काय आहे. आपणास माहिती आहे का
कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या
पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते त्या
प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे
वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न माघता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हावा
या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.
कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या
आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असणेकासव हा जीव
सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त
होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी’, अशी
इच्छा निर्माण झाली.
कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात
गाभार्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे
प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.
कासवाचे गुण
१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची
मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व
देवतेकडून प्रक्षेपित होणार्या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड
दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची
तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.कासवाला नमस्कार
करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थकासवाला नमस्कार करूनच
मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या
अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते’, असा
आहे.
आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कूर्म म्हणजे श्रीविष्णूला आपल्या घरात
ठेवल्याने श्रीविष्णू सोबत श्रीमहालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो. घरात
देवा समोर अथवा तिजोरी समोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील
पाणी रोज पुर्ण घरात शिंपडावे. आपण यश मिळविण्यासाठी अपार मेहनत करतो.
दिवस-रात्र एक करतो. तरीही अनेकदा यश मिळत नाही. अनेकदा याचे मुख्य कारण
तुमच्या घरातही असू शकते. वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे
निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा. साधनांच्या
आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. यासंदर्भात खालील टिप्सचा वापर
करा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर
घरातील रोग व शत्रू दूर रहातात. करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी
धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात
ठेवून उत्तर दिशेला ठेवा.कासव स्वतः दीर्घायुषी(120 वर्ष आयुष्य आहे
कासवाला) असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते.
वरील काही माहिती मध्ये अंधश्रद्धा असू शकते तरी फक्त माहिती म्हणून वाचणे हाच केवळ हेतू ठेवून माहितीस्तव सादर.
________________________________
*श्री लक्ष्मण काटेकर,*
*सोलापूर, महाराष्ट्र*
*7588020886*
जैवविविधता

जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा
पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या
निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर
अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर
ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात.
एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त
झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा
मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे.
फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास
‘कॅम्ब्रियनकल्पा मधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय
सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी
वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’
युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन
ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात
मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम
बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा
नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले.
जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता
हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी
हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी
सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी
घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून
त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर
सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व
जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर
त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?
*उत्पत्ती :-
इ.स.१९६८मध्ये रेमंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या
शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्यानी ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या
सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या
संदर्भात वापरला. सुमारे दहा वर्षांतर, म्हणजे १९८०मध्ये विज्ञान आणि
पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवण्याच्या वेळी हा शब्द चांगलाच रूढ झाला होता.
थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोद्घातामध्ये
लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-
नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा १९७५ सालापासून वापरात होती. पण १९८०मध्ये
रॉबर्ट ई जेनिन्स यानी अमेरिकेत जैविकविविधता असा शब्द रूढ करण्याचा
प्रयत्न केला. सध्या अमेरिकेत नॅचरल हेरिटेज असा शब्द वापरला जातो. या
शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूशास्त्र- जिऑलॉजी आणि
भूप्रदेशाचा समावेश केला आहे.
*व्याख्या :-
जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य
व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जाति विविधता, आणि जातिमधील संपन्नता
(जीवशास्त्रीय संपन्नता). जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “
जैवविविधता म्हणजे जनुकांची व्यक्तता, जातीमधील विविधता आणि परिसंस्थेमधील
विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे
(१). जातीमधील विविधता,
(२) परिसंस्थेमधील विविधता आणि
(३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता.
इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अॅन्थनी कँपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली.
*जैवविविधतेचा विस्तार :-
जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये
विस्ताराची विविधता आढळतेच, एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा
सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता, तापमानावर, पडणाऱ्या
पावसाच्या प्रमाणावर, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर, भूप्रदेशाच्या
गुणधर्मावर, आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
सजीवांच्या देशी जाति आणि अप्रिसंस्थेच्या(?) वितरणाच्या अभ्यासास
जैवभूगोल असे म्हणतात.
विषुववृताजवळील उष्णप्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी
विविधता आढळते, हे वर आलेच आहे. २००६ मध्ये आययूसीएन या संस्थेने दुर्मीळ
किंवा अस्तित्व धोक्यात आल्याचे जाहीर केलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७
एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर
पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटीनी अधिक
आहे.
*अक्षवृत्तीय प्रवणता :-
सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता
वाढत जाते. शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक
असते. विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते.
या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात.
पर्यावरणातील अनेक घटकांचा विविधतेवर परिणाम होतो. पण सर्वाधिक परिणामकारक
घटक तापमान हा आहे. कमीतकमी आणि सर्वाधिक तापमानातील फरक जेवढा अधिक तेवढी
जैवविधता कमी.
*जैवविविधता समृद्ध क्षेत्र (हॉटस्पॉट) :-
जैवविविधता समृद्ध क्षेत्र अशा ठिकाणांना हॉट स्पॉट म्हणावे ही कल्पना डॉ.
सबिना विर्क यानी १९८८मध्ये मांडली. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने
स्थानिक जातींचे वसतिस्थान आहे त्यास जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता
येते. बहुतेक समृद्धक्षेत्रे मानवी वस्त्यांजवळ आहेत. समृद्धक्षेत्रे जगभर
विखुरलेली असली तरी उष्ण कटिबंधातील वनांत आणि सदाहरित जंगलांत त्यांची
संख्या सर्वाधिक आहे.
ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्यवन हे त्यांपैकी एक. या वनामध्ये २०,०००
प्रकारच्या वनस्पति, १३५० पृष्ठवंशी प्राणी आणि लक्षावधी कीटक आहेत. यातील
निम्म्याहून अधिक असे आहेत, की ते इतरत्र कोठेही आढळत नाहीत. मादागास्कर
बेटावर एकमेव अरण्य, मादागास्कर शुष्क वन आणि सपाटीवरील पर्जन्यवन आहे.
मादागास्कर मूळ आफ्रिकन भूमीपासून साडेसहा कोटी वर्षांपूवी वेगळे झाल्याने
या वनातील सजीवांमध्ये प्रदेशनिष्ठता दिसते. मादागास्करच्या भूमीवर अनेक
जाती आणि परिसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत. इंडोनेशियामधील
१७००० बेटांनी १९,०४,५६० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. या
प्रदेशामध्ये जगातील दहा टक्के सपुष्प वनस्पति, बारा टक्के पृष्ठवंशी
प्राणी, सतरा टक्के सरपटणारे प्राणी, पक्षी आणि उभयचर प्राणी असे २४ कोटी
माणसांच्या वस्त्यांच्या सहवासात आहेत. समृद्ध जैवविविधता असलेले काहीं भाग
वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशनिष्ठ् भागापासून उगम पावलेले असल्याने
त्यांच्यामध्ये नेहमीच्या बदलाहून वेगळे बदल घडून आलेले आहेत. उदाहरणार्थ
उंच पर्वतावर असलेला आल्पीय प्रदेश,किंवा उत्तर अमेरिकेतील दलदल (पिट बॉग).
जैवविधतेचा अचूक अभ्यास, असा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो असे ध्यानात आले आहे,
*जैवविविधता विकास (उत्क्रांति):-
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे.
सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही
तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना
असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी
अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न
कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये
जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे
म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती
झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक
संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या
वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह
विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या
निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये
पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या
जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण
झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे.
पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या
विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले).
या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या
दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की
आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे
म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही
प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या
म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक
नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी
असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत
पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी
सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला
(डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता
वृद्धिंगत होते.
*अधिकतम सजीव संख्या :-
पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील ही पृथ्वी ग्रहाची सजीव
धारण क्षमता झाली. उदा. एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता
येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाति-विविधता किती असू
शकेल याचा अंदाज काढता येतो. सागरी सजीवाची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने
तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या
म्हणण्याप्रमाणे चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४%
प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची
वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमेध्ये
चतुष्पाद पोहोचतील.
याउलट फेनेरोझोइक कालखंडामध्ये जैवविविधतेच्या वाढीचा आलेख अपास्ताकार
(हायपरबोलिक) आकाराचा दिसतो. पहिल्या स्तरातील धन पुन:प्रदाय पद्धतीने
(पॉझिटिव्ह फीडबॅक) होतो. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून
निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा
असल्यास सजीवांची विविधता ऋण पुन:प्रदाय पद्धतीने कमी होते. अपास्ताकार
वाढीचे आणखी एक उदाहरण म्हणजे मानवी लोकसंख्येमधील वाढ. तंत्रज्ञानाच्या
वाढीबरोबर आणि कृषि क्षेत्रामधील सुधारणामुळे अजून मानवी लोकसंख्या चरम
वृद्धि संख्येपर्यंत पोहोचली नाही.
मानवाच्या उदयाबरोबर आणखी एक विलोपन क्रिया चालू झाली आहे यावर बहुतेक
वैज्ञानिकांचे एकमत होत आहे. यास होलोसीन मास एक्स्टिन्शन असे म्हणण्याची
पद्धत आहे. होलोसीन या ग्रीक शब्दाचा अर्थ “आधुनिक” असा आहे. प्लाइस्टोसीन
कालखंडाचा अस्त झाल्यानंतर होलोसीन युगाचा सुमारे ११,००० वर्षापूर्वी
प्रारंभ झाला. इसपू १०,००० मध्ये कृषि व्यवस्थेचा प्रारंभ. परिसरामध्ये
तंत्रज्ञान आणि अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास
राहण्यायोग्य बनवणे हे होलोसीन युगाचे वैशिष्ठ्य. मानवी हस्तक्षेपामुळे
सध्या विलोपन क्रिया एवढी झपाट्याने चालली आहे की फक्त १०० वर्षामध्ये इतर
सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे.
*जैवविविधतेचा मानवास फायदा :-
जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कार्बन डाय
ऑक्साइड चक्र सुरळीत राहते. हवेचे सर्व घटक संतुलित राहतात.जलचक्र
सुरळीतपणे सुरु राहते. जलचक्रामुळे पाणी शुद्ध होते. जमिनीची धूप थांबते.
अश्मयुगापासून मानवी हस्तक्षेपामुळे सजीव जातींचा विनाश व्हायला प्रारंभ
झाला. याआधी नैसर्गिक आपत्ति हेच फक्त जातिविनाशाचे एकमेव कारण होते.
जीवाश्मांच्या अभ्यासावरून अश्मयुगापासून जातिविनाशाचा वेग शंभर ते दहा
हजार पटीनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
*कृषि :-
पिकांमधील विविधतेमुळे नेहमीचे पीक रोग किंवा किडीमुळे नष्ट झाल्यास
पिकामध्ये हवे ते बदल घडवून आणण्यासाठी पिकांच्या वन्य जातींमधून
इनब्रीडिंग करता येते.
१८४६मध्ये आयरिश पोटॅटो ब्लाइट नावाच्या कवक जन्य बटाट्यावरील रोगाने ऐंशी
टक्के बटाट्याचे पीक नष्ट झाले. आयरिश लोक अन्नासाठी केवळ बटाट्यावर
अवलंबून असल्याने १८४४ मध्ये असलेल्या बटाट्याच्या उत्पन्नापेक्षा १९४६
मधील पीक केवळ वीस टक्के होते. दहा लाख लोक यानंतरच्या दुष्काळात मरण पावले
आणि तेवढेच स्थलांतरित झाले. १९४६ पर्यंत बटाट्याच्या पिकासाठी केवळ दोन
जातींचे बियाणे वापरात होते. हे बटाट्याचे दोन्ही वाण Phytophthora
infestans या कवकास बळी पडणारे होते.
१९६६मध्ये इंडिनेशियामधील भाताचे पीक ‘ राइस ग्रासी स्टंट व्हायरस’ या
रोगामुळे नष्ट झाले. एका तपकिरी रंगाच्या तुडतुड्यापासून विषाणूचा प्रसार
होतो. इंडोनेशियाचे प्रमुख अन्न भात असल्याने या विषाणूचा प्रतिकार
करण्यासाठी १९७० मध्ये ६२७३ या भारतीय भाताचे वाण तपासण्यात आले. त्यातील
केवळ एका भाताचे वाण विषाणूचा प्रतिकार करणारे निघाले. या एका भाताच्या
वाणाचा इतर भातांशी संकर करून इंडोनेशिया, फिलिपाइन्स, चीन, जपान मधील
भाताचे पीक यशस्वीपणे वाचविण्यात आले.
१९७०मध्ये श्रीलंकेमध्ये पडलेल्या कॉफीवरील तांबेऱ्यामुळे तेथील सर्व
कॉफीचे मळे नष्ट झाले. याचा परिणाम एवढा भयंकर होता की एकेकाळी कॉफी
निर्यात करणाऱ्या श्रीलंकेचे राष्ट्रीय उत्पन्न चाळीस टक्क्यानी कमी झाले.
त्यानंतर श्रीलंका हा केवळ चहा निर्यात करणारा देश अशी ओळख या देशाची झाली.
शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे यासाठी एकच पीक विस्तृत क्षेत्रावर घेण्याची
पद्धत आहे. कृषि व्यवसायातील बहुतेक अरिष्टे एकाच वाणाची निपज विस्तृत
क्षेत्रावर केल्याने झालेले आहेत. यातील प्रमुख म्हणजे युरोपमध्ये १९व्या
शतकातील मद्य उद्योगावरील संकट आणि अमेरिकेतील मक्यावरील रोगामुळे पडलेला
१९७०चा दुष्काळ.
मानवी वापरासाठी असलेले ८०% अन्न फक्त वीस प्रकारच्या वनस्पतीपासून
मिळविण्यात येते.पण त्याच्या ४०,००० जाती प्रत्यक्ष मानवी वापरात आहेत.
यामध्ये निवारा, अन्न, फळे, औषधे, आणि वस्त्रप्रावरणे यांचा समावेश होतो.
पृथ्वीवरील जैवविविधता वाढत्या लोकसंख्येची गरज अजून भागवत आहे यात शंका
नाही पण मानवी वापराच्या जातींमधील विविधता झपाट्याने कमी होत आहे. याचा
विचार करण्याची पाळी आली आहे.
*मानवी आरोग्य :-
जैवविविधता आणि मानवी आरोग्य हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कारण होत
आहे. जैवविविधतेच्या नाशामुळे पृथ्वीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे यावर
शास्त्रीय संशोधन झाले आहे. जागतिक हवामान बदलाचे कारण हे मानवी आरोग्यावर
परिणाम करणाऱ्या अनेक कारणापैकी एक. रोगाचे वाहक आणि कारक असणाऱ्या
सजीवांचा प्रसार, गोड्या पाण्याची कमतरता, कृषि उत्पादनामधील घट, कृषि
उत्पादनामधील तोच तोच पणा वगैरे. एखादी जाति नष्ट झाल्यानंतर निसर्गत:
त्यास पर्याय उपलब्ध असायचा. पण आता असे पर्याय कमी उपलब्ध होत आहेत. ज्या
जाति टिकून राहत आहेत त्या नवीन पोषितामध्ये संक्रमित होत आहेत. जुनेच आजार
नव्या दाद न देणाऱ्या आजारांत बदलले जात आहेत. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि
इन्फ्लुएंझा हे एकाच विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. वेस्ट नाइल व्हायरस,
लाइम आजार, हांटाव्हायरस असे नवीन विषाणू माणसामध्ये येण्यामध्ये त्यांच्या
मूळ पोषितामध्ये झालेले परिवर्तन कारणीभूत आहे.
पाण्याची वाढती मागणी आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसणे हा मानवी आरोग्याशी
निगडित महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. स्वच्छ पाण्याचे वितरण वाढले असले
तरी अनेक देशामध्ये पाण्याचे स्रोत नाहीसे होत आहेत. २००८च्या जागतिक
लोकसंख्येच्या अभ्यासावरून निघालेल्या माहितीनुसार अविकसित राष्ट्रामधील
फक्त ६२% व्यक्तीना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.
जैवविविधतेशी संबंधित आणखी काहीं प्रश्न म्हणजे अन्न सुरक्षा आणि सकस
अन्नाची उपलब्धता, संसर्गजन्य आजार, आरोग्य विज्ञान , औषधांची उपलब्धता ,
सामाजिक आणि मानसिक आरोग्य. जैवविविधतेमधून औषध निर्मिती, आणि नव्या
औषधांचा स्रोत सतत उपलब्ध आहे. आजच्या घटकेस अमेरिकन औषध उद्योगातील ५०%
औषधामध्ये वनस्पति , प्राणी किंवा जीवाणू, कवके यांचा प्रक्रियेमध्ये
कोठेतरी वापर केलेला आहे. जगातील ८०% लोकसंख्या प्राथमिक आरोग्यसेवेसाठी
नैसर्गिक उपचारपद्धति किंवा नैसर्गिक औषधावर अवलंबून आहे. आजपर्यंत फार
थोड्या जातींचा त्यांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास झालेला आहे.
जैवविविधतेचा नव्या इलेक्ट्रॉनिक्स आणि बायालॉजी यांच्यापासून निघालेली
संयुक्त शाखा ‘बायॉनिक्स’ मध्ये झपाट्याने वापर चालू आहे. १९८०नंतर औषध
उद्योगामध्ये नव्या औषधांची निर्मिती कमी झाल्यासारखे वाटत होते. पण जनुकीय
शास्त्र आणि मानवी जनुक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नव्या रासायनिक
औषधांच्या निर्मितीवर भर पडत आहे. सागरी जैवविविधतेवर आधारित औषध निर्मिती
नव्याने तपासून पाहण्याची गरज उत्पन्न झाली आहे.
*औद्योगिक वापर :-
अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर
होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात.
जैवविविधता पाणी, इमारती, लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुन: पुनः
निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक
नुकसान.
*छंद, संस्कृती आणि सौंदर्यदृष्टी :-
जैवविविधता आस्तित्वात असण्याने पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण,
वनस्पति आणि प्राण्यांमधील सहसंबंध यांचा अभ्यास असे छंद जोपासता येतात.
जंगलातील आडवाटा तुडवणे, फुलांचे ताटवे न्याहाळणे अशा निसर्ग सहलीनी जो
आनंद मिळतो तो जैवविविधता नष्ट करण्याने हिरावून घेतला जातो. शंभर
वर्षापूर्वी फक्त पुस्तकांमध्ये वर्णन केलेला एखादा पक्षी किंवा फुलपाखरू
किंवा एखादी औषधी वनस्पति आणि त्याची फुले परत एकदा पहावयास मिळावी याचा
आनंद अवर्णनीय आहे. सध्या जंगलामधून केवळ वाघ पहायला किंवा हत्तीवरून जंगल
तुडवणे यासाठी सफारी आयोजित केल्या जात आहेत. केनियासारखा देश
सिंह,झेब्रा,आणि, पाणघोडे पहाण्यासाठी जगभरातील पर्यटकाना आकर्षित करतो
आहे.
जैवविविधतेमुळे अनेल संगीतकार, चित्रकार, शिल्पी, लेखक आणि कलावंतामध्ये
सौंदर्यदृष्टी आलेली आहे. अनेक संस्कृतीमध्ये जैवविविधता टिकवून राहणे
म्हणजेच संस्कृति असा दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे. राजस्थानसारख्या कमी
पावसाच्या प्रदेशामध्ये खेजडी झुडूप आणि कृष्णमृग यांच्या रक्षणासाठी
बिष्णोई जमातीनी प्राण गमावले आहेत. महराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील
अनेक देवस्थानांच्या आश्रयाने वाढलेल्या देवरायामध्ये झाडाचे पानसुद्धा
तोडायचे नाही अशा अलिखित नियमामुळे अनेक प्रजाति टिकून राहिलेल्या आहेत.
बागामध्ये शोभेच्या वनस्पति लावणे, वाढवणे, औषधी वनस्पति उद्यान, घरगुति
मत्स्यपालन, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, अशा अनेक व्यबसासायांचा उगम
जैवविविधतेमध्ये आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशा छंदाना मनापासून प्रतिसाद
देते. व्यावसायिकपणे दुर्मीळ प्राणी जोपासणे, त्यांना वाढवणे, दुर्मीळ
पक्षी सांभाळणे त्याना परत निसर्गामध्ये सोडणे, त्यांचे संवर्धन अशा
छंदांचे नेमके मूल्यमापन करणे हे कठीण काम आहे. पण केवळ निसर्गाच्या
प्रेमापोटी काहीं संस्था हे काम पदरमोड करून करत आहेत. राजकीय दृष्ट्या
ग्रीन पार्टी नावाचा पक्ष १९७०पासून जर्मनी, बेल्जियम, स्वीडन यांमध्ये
पर्यावरणरक्षण या अजेंड्यावर काम करतो आहे. आज ही लाट युरोप आणि उत्तर
अमेरिकमध्ये एक प्रभावी पक्ष बनली आहे.
*पर्यावरण सेवा :-
जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा प्रत्यक्ष
नसून अप्रत्यक्षपणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन,
गोड्या पिण्याच्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील
जैवविविधतेच्या मदतीची रुपयात किंवा डॉलरमध्ये किंमत केल्यास कोणत्याही
प्रगत राष्ट्राला ती चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्नघघटक चक्र, सुपीक
जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्नांनी करायची ठरवली तर ते अशक्य
आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य
आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे करण्यात येणाऱ्या परागीभवनाचे
द्यावे लागेल. कीटकांनी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून
घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल याचा विचारच केलेला बरा.
*सजीव जातींची संख्या :-
जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट
ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण
जातींचा २०१० मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी
असावा असे म्हटले आहे.
१ ते कोटी कीटक
अर्धा ते १ कोटी जिवाणू
१५ लाख कवके
१० लाख अष्टपाद
सूक्ष्म जीवांची नक्की संख्या किती याचा अंदाज अजून आलेला नाही. जागतिक
सागरी पाण्यातील सूक्ष्म जीवांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की
प्लवंगामधील सूक्ष्म जीवांमध्ये अधिक विविधता आहे. २००४ – २००६ मध्ये
केलेल्या सूक्ष्म जीवांच्या अभ्यासानंतर सध्या ‘जाति’ या व्याख्येमध्ये
ओळखले जाणाऱ्या सजीवांना काही मर्यादा आहेत.
सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे.
*जाति विलोपनाचा वेग :-
गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. २००७मध्ये
जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्वात
असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५० पर्यंत नष्ट होतील असे विधान केले.
यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर
आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका
मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे
एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत
झाले आहे.
*जैवविविधतेस असणारे धोके :-
अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि
द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या
निसर्गतज्ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या
घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन(अधिवास
नाश), इन्व्हॅझिव स्पिशीज(नव्या ठिकाणी नको त्या जातीचा प्रवेश), ह्यूमन
ओव्हर पॉप्युलेशन(मानवी लोकसंख्येची वाढ) आणि ओव्हर हार्वेस्टिंग(कृषि
क्षेत्राची अनिर्बंध वाढ) असे केले आहे. “इंटरनॅशनल युनियन ऑफ काँझरव्हेशन
ऑफ नेचर”(आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे
प्रत्यक्ष धोके आहेत.
*अधिवास बदल :-
जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा
धोका उद्भवतो. सहाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ,
जंगलाच्या जमिनीमध्ये खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जलप्रदूषण
याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे
क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर
अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाति व समुद्रसपाटीलगत
असणाऱ्या जंगलातील जाति-अधिवासबदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग
जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलामधील हत्ती उन्हाळ्यात पीक
क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते
तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच
येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणामध्ये
अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पति परत कधीच लावता येत नाहीत. एकाच
प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता
नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७मधील अभ्यासामधून असे
समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील
विविधतेसाठी जातींमध्ये जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव
म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे. अशा वेळी परिसरामध्ये एकच जाति प्रबळ
ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव
कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे. हाच प्रकार
कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पति म्हणजे
तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही.
*जैवविविधता विषयक कायदे :-
पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन कायदा १९९९
*संदर्भ:- वेबसाईट, ग्रंथ संग्रह.
*आजचा दिवस दि 22 मे 2019 जैवविविधता दिन म्हणून साजरा करूया. जिवांचे जतन करूया
______________________________
*संकलन*
*श्री लक्ष्मण काटेकर,*
*सोलापूर ( महाराष्ट्र )*
*7588020886*
छत्रपती संभाजी महाराज यांची भूषणे
#छत्रपती संभाजी महाराज
भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्वीजयी, महामानव ,क्षत्रियकुलावतंस
, श्रीमंतयोगी ,राजाधिराज , पराक्रमी, प्रेरणादायी , स्वच्छ राजकारणी ,
जिद्दी , मुस्तद्दी , निर्भिड ,शूरवीर , प्रगल्भ बुद्धिमान , चरित्रसंपन्न
,प्रजावत्सल ,
न्यायप्रिय , जगविख्यात ,प्रयत्नवादी , विज्ञाननिष्ठ , निर्व्यसनी ,
शक्तीपीठ , ज्ञानपीठ , प्रेमळ , प्रतिभासंपन्न , संभाषणचतुर , बहुभाषिक ,
समतानिष्ठ , निस्वार्थी , कदरदान ,स्वराज्याचे व सुराज्याचे आद्यसंकल्पक ,
आद्यक्रांतिकारक , धर्माभिमानी , उदार , संयमी , मानवतावादी , भव्यदिव्य
,उत्तुंग आणि आदर्श व्यक्तीमत्व , अभिषिक्त , जगतमान्य लोकराजा, जाणता राजा
,
कपालाळा दोन आडवे शिवगंध असलेले , छातीकडे धारधार नाकाचा तरतरीत शेंडा ,
दोन्ही डोळ्यात दोन सूर्य वागविणारे , लांबट डोळे असणारे , रंगसतेज आणि
तेजस्वी मुद्रा असलेले , आणि गळ्यात चौसष्ट कवड्यांची आई भवानी देवीची पावन
माळ परिधान करनाऱ्या अश्या महाराणी सईबाईसाहेबांच्या मर्द मराठी
श्रीमंतयोगी, नीतीवंत , बुद्धिवंत राजा शंभुछत्रपती महाराजांना त्रिवार
मानाचा मुजरा.
बुधभूषण ….एक सारांश
छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले लिखित……..
श्री ‘बुधभूषण’ छत्रपति संभाजीराजे शिवाजीराजे भोसले रचित संस्कृत
ग्रंथ. बुध म्हणजे शहाना, विद्वान व भूषण म्हणजे दागिना. थोडक्यात
विद्वानाचा दागिना असा अर्थ असलेला ‘बुधभूषण’
छत्रपति संभाजीराजांच्या सिधहस्त लेखणीतून साकारलेला बुधभूषण.
उप्लब्ध असलेल्या माहितीनुसार छ. संभाजी महाराजांनीचार ग्रंथ लिहले आहेत.
त्यापैकी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ तर सातसाटक(satsatak), णखाशिखा, व
नायिकभेद हे ग्रंथ भॉजपुरी भाषेत व हिंदी भाषेत आहेत.
यामधील बारेच लिखाण उप्लब्ध नाही…. या सर्व ग्रंथामधील काही भाग
वेगवेगळ्या ग्रंथालयात अस्तव्यस्त स्वरुपात असेल असा एक अंदाज आहे. तसेच
काही लिखाण परदेशात सुधा असेल. बुधभूषण मधील सुधा पहिला व दुसरा अध्याय
पूर्ण तर तिसरा अध्याय निम्मा सापडला आहे. पुढे किती असेल……. अंदाजच केलेला
बरा.
यातील सारंशरूपी काही भाग तुमच्यासमोर आणत आहे.
उपलब्ध असलेल्या पहिल्या अध्यायात पूर्वजांचे स्मरण, देवतवंदन तसेच दुसर्या अध्यायात छ. संभाजीराजांनी विशेष राजनीतीवर केलेले भाष्य आजच्या काळातही मार्गदर्शक ठरावे असे आहे. तिसरा अध्याय राजपुत्र व राजकन्या यांना उपयुक्त अशा माहीतीने भरलेला आहे.
छत्रपति संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहण्यास सुरवात केली व वयाच्या सतराव्या वर्षी तो पूर्ण केला.
बुधभूषण वाचत असताना ह्या महान ग्रंथात आलेले संदर्भ हजारो वर्षापूर्वीच्या
संस्कृतिक धार्मिक व्यवस्थेचा उलगडा होईल एवढे अभ्यासपूर्ण आहेत.
शिवकुळाचे श्रधास्थान श्री शिवशंकर, श्रीपार्वती, श्रीभवाणी देवी,
श्रीकृष्णा भगवान, गणपती, गौतम बुद्ध, बळीराजा यांच्याबद्दल शंभुरजांना
आत्यंतिक आदर असल्याचे बुधभूषण वाचताना समजते.
शंभुराजांच्या ह्स्टलिखितातील ८८३ संस्कृत शोल्क ईस १९२१ च्या सुमारास रॉयल
एशियाटीक सोसायटी च्या ब्रिटीश लाइब्ररी मुबई येथे उपलब्ध झाले होते.
भांडारकर संस्थेने त्याचे वर्गीकरण करताना ३ अध्याय केले.
अध्याय १ला – १९४ श्लोक हयामध्ये देव-देवतांना वन्दनाचे श्लोक आहेत
अध्याय २रा – ६३० श्लोक हा संपूर्ण अध्याय राजव्यवहारशी संबधित आहे
अध्याय ३रा – ५९ श्लोक हा अध्याय राजपुत्र व राजकन्येसाठी आहे
एवढी महासागरसारखी माहिती आपल्यासमोर ठेवुनही छ. शंभुराजे नम्र भावनेने म्हणतात,
“अशा या शंभूनृूपाने (पुरातनशास्त्राचे) विवेंचन करून त्यातील सार्थअंश या
ग्रंथात घेतला आहे व त्याचवेळी सत्य असल्याचे मंथन करून निरक्षीर न्यायाने
राजहनसप्रमाणे अमृताचे स्वागत करुन पाण्याचा त्याग करावा. दुधाचे तेवढे
सेवन करावे.”(श्लोक क्र १७)
(येथे मूळचा संस्कृत श्लोक देण्याचा मी प्रयत्न केला पण त्यामध्ये एरर येत आहे.)
बुधभूषण ची सुरवात करताना शंभुराजे लिहतात,
“गर्व-नमोट हत्तिना सहजरीत्या जिंकून देव-दानवंच्या स्तुती स पात्र ठरलेला,
भक्तांच्या विघ्नानचे हाणन करणार्या श्री शिवशंकराच्या बाळकरात्नस (पुत्र
गणरायस) मी वंदन करतो.” (श्लोक क्र. १)
ह्या श्लोकापासून सुरवात करून राजांनी सुरवातीला देवांना वंदन केले आहे.
पुढे त्यानी आपल्या स्वकुळाचे वरणन केले आहे. छ. संभाजी महाराज किती उच्च
दर्जाचे कवी होते हे त्यांचे लिखाण वाचूनच समजेल.
सातव्या श्लोकात ते शहाजी महाराजांच्या बाबतीत लिहतात तर ८ ते १४
श्लोकांच्या दरम्यान छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत लिखाण आहे.
त्यांच्याविषयी अत्यंत काव्यपूर्ण शबडात लिखाण केले आहे. पुढे १५व्या व
१६व्या श्लोकात ते स्वतः विषयी लिहाताना म्हणतात —-
“त्या शिवाजीराजांच्या भोवतीच्या सार्या राज़ेलोकांत शिरोभूषण वाटणारा,
काव्य, कला, भाषा, साहित्य, पुराण, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी
त्यांचा पुत्र शंभुराजे या नावाने प्रसिधा आहे.”
पुढे राजांनी भवानी स्तुती व प्राचीन नमस्कृतीचे श्लोक लिहून धेवले आहेत.
थोडेसे विषयांतर—–
छ. संभाजी महाराजांचे प्रेरणा स्थान जसे शिवशंकर पार्वती होते तसेच
श्रीकृष्णा व गौतम बुध्हही होते. त्यांच्या विचारांवर श्रीकृष्ण व
बुधांच्या विचारांचाही प्रभाव दिसतो. गौतम बुधांचा प्रभाव असल्यामुळे
त्यानी आपल्या ग्रंथास ‘बुधभूषण’ हे नाव दिले असावे. याशिवाय शंभुराजांच्या
अनेक घटना ह्या गौतम बुधांच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या आढळतात.
उदा.
दोघेही राजपुत्र. दोघेही अत्यंत बुधिमान, दोघेही अत्यंत दयवान, दोघांचेही
वडील स्वतंत्र राजे. दोघांच्याही मातांचे लहानपणी निधन झालेले. दोघंाही
वडीलांनी सर्वश्रेष्ता क्षिशन दिले. दोघांनीही तरुण वयातच स्वतंत्र
राज्यकारभार संभाळावा लागला. दोघांनाही मंत्रांच्या वादास तोंड द्यावे
लागले. दोघांच्याही पत्नी च्या नावात साधर्म गौतम बुधांच्या – यशोधरा तर
शंभुराजांच्या- येसुबाई. दोघीनीही अत्यंत सामर्थ्याने परीस्थीतीवार विजय
मिळवला. गणसमूहमध्ये एकता टिकावी म्हणून बुधांना गृहत्याग करावा लागला तर
स्वराज्य टिकावे म्हणून वयाच्या ९व्या वर्षी शंभुराजांना मोगलानकडे ओलिस
राहावे लागले.
दोघांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसामण्यासाठी करता केला व यासाठी उद्बोधक लिखाण केले. दोघांनीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत सामाजिक एकता व स्वातंत्रासाठी प्रायन्त केले. दोघांचेही लिखाण जाळण्याचा प्रायन्त केला. दोघांचेही लिखाण मुल्सवरुपात परदेशात गेले. दोघेही जिवंतपणीच आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ थरले. लेखकांच्या मते हा कोणताही योगायोग नसून शिवकुळातील ईतिहासाची पुनरावृती आहे.
आणखीन एक योगायोग –
१५ ऑगस्ट १६६६ मध्ये छ. शिवाजी महाराजानसह शंभुराजे मोगल कैदेतून बाहेर
पडले तर १५ ऑगस्ट १९४७ ईंग्रज देश सोडून निघून गेले. तसेच २६ जानेवारी १६७१
रोजी शंभुराजे गणतंत्र पधतीने स्वतंत्र कारभार पाहु लागले तर २६ जानेवारी
हा स्वतंत्र भारताचा गणराज्यदीन.
संदर्भ :- वेबसाईट
संकलन,
श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
7588020886.
ऐतिहासिक पुस्तके
ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत
https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing
1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव – चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम
छावा, श्रीमान योगी, बाजींद, मृत्युन्जय, शंभू राजे ही पुस्तके कोणाला PDF मध्ये हवी असल्यास खालील लिंक वरून डाउनलोड करा किंवा ऑनलाइन वाचा
ZP गुरुजी व्हाट्सअप्प ग्रुपवरून
http://www.alagg.co.in/books.html
बुलडाणा जिल्ह्याचे वैभव मैलगड किल्ला
सातपुडा पर्वतरांगेवरील एका डोंगरावर मध्यप्रदेश आणि महाराष्टाच्या सीमेवर मैलगड किल्ला आहे. या किल्ल्याची विशेषतः अशी की अंजिंठा वेरुळच्या लेण्यांप्रमाणे संपूर्ण किल्ला हा दगडांच्या काळ्या पाषाणात कोरला आहे. डोंगर एवढा उंच की पायथ्याहून वर नजर टाकल्यास अवसान गळते. डोंगरावर गेल्यावर येथे काहीच नसल्याचे निदर्शनास येते. मात्र, दगडांमध्ये कोरलेल्या भुयारसारख्या खोल्यांकडे बघितल्यावर अद्भूत व विशेष पद्धतीने बांधकाम केलेल्या या किल्ल्याची महती पटायला लागते. विदर्भातील अन्य कोणत्याही किल्ल्यामध्ये अशाप्रकारचे बांधकाम दिसत नाही. अन्य कोणत्याही किल्ल्यावर न दिसणारी एक विशेष बाब येथे दिसते ती म्हणजे किल्ल्याच्या सुरुवातीलाच एका किल्ल्याचा संपूर्ण नकाशा दगडावर कोरलेला आहे. या नकाशावरुनच किल्ल्याच्या भव्यतेचा परिचय येतो. किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे.
मैलगडपासून जवळच असलेल्या जामोद या गावाला प्राचिन इतिहास लाभला आहे. त्रेतायुगात भगवान श्रीरामाचे पिता राजा दशरथ यांनी येथे पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्याचे पुराणात लिखीत आहे. लक्ष्मणाला मेघनाथाचा बाण लागल्यावर त्याचे प्राण वाचविण्यासाठी हनुमान हिमालयातील द्रोणागिरी पर्वत घेवून जात असताना द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा जामोद जवळील जंगलात पडला व तेथे एक खोल दरी तयार झाली. ती जागा सध्या बादलखोरा म्हणून प्रसिद्ध आहे. द्रोणागिरी पर्वतानंतर संजीवनी केवळ बादलखोऱ्यात सापडत असल्याचे उल्लेख अनेक आयुर्वेदीक ग्रथांमध्ये आढळतात. तसेच द्वापारयुगात पांडव येथे येवून गेले असल्याचाही उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आला आहे. पांडवांनी ज्या नदीच्या काठी मुक्काम केला त्या नदीला पांडव नदी संबोधिले जाते. ही नदी आजही याच नावाने ओळखली जाते. एकंदर यावरुन जामोद येथे प्राचिन काळापासून वस्ती होती, असे निदर्शनास येते. उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्यासाठी पूर्वी पायनघाट हा मार्ग होता. या मार्गावर जामोद व मैलगड किल्ला होता. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशी, व्यापारी किंवा राजे, महाराजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत होता. मैलगड हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. बऱ्हाणपूरवरुन 50 किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले व कुणी केले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, किल्ल्याच्या बांधकामावरुन किल्ला प्राचिन असल्याचे निदर्शनास येते.
सातपुडा पर्वतरांगेतील एका डोंगरावर असलेल्या या किल्ल्याची विशेषतः म्हणजे हा संपूर्ण किल्ला डोंगरातील काळ्या पाषाणात कोरुन बांधला आहे. एक मैल चौरस असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. गडावरुन बघितल्यावर येथे काहीच नाही असे दिसते. मात्र, दगडामध्ये विविध ठिकाणी मोठ-मोठया खोल्या आहेत. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर चारही बाजूने दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. मात्र, हा संपूर्ण डोंगर पोखरुन त्यामध्ये मजबूत असा किल्ला असल्याचे चारही बाजूने बघितल्यावर निदर्शनास येते. यामध्ये 20 ते 25 खोल्या असाव्यात. एवढ्या उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. आम्ही एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळ्यात किल्ल्यावर गेल्यावरही तेथे पाणी होते. येथे एक सासू, सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे. दगडांमध्ये कोरुन हे जलकुंभ बांधण्यात आले आहे. येथे एका कपारीतील पाणी गरम ते दुसऱ्या कपारीतील पाणी थंड होते, असे पायथ्याशी राहणारे आदिवासी सांगतात. आता मात्र, दोन खोल्यांमधील भिंत पडल्यामुळे पाणी थंड आहे. ज्वालामुखीच्या शांत झालेल्या मुखातून येथे गरम पाणी आणण्यात आले, असे काही नागरिक सांगतात. तसेच येथील पाण्याचा एक उपसर्गही आहे. गडावरुन 14 ते 15 किमी असलेल्या मोहिदपूर गावात या गडावरील पाण्याचा आउटलेट आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथे लिंबू टाकले तर मोहिदपूर येथे निघत होते, असे नागरिक सांगतात. सध्याही येथे पाण्यात निळ टाकली तर मोहिदपूर येथे निळे पाणी निघते. डोंगराच्या कडा समोरील बाजूने दगडांनी बांधल्या आहेत. मध्यप्रदेशच्या बाजूने डोंगरावर एक बुरुज आहे. एवढेच एक बांधकाम येथे दगडांनी व डोंगराच्या भुपृष्ठावर केलेले आहे. अन्यथा सर्व बांधकाम हे दगडांमध्येच आहे. हा बुरुज खालून दिसतो. याचे बांधकाम दगडांमध्ये असून, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी छिद्र आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेकडून एक अष्टकोनी विहीर व मंदिर आहे.
इ.स. 1801 च्या सुमारास वऱ्हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती. त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू याच्या अधिपत्याखाली पाच हजार सैन्य देवून पाठविले. गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला. किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला.
कसे जाल : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदपासून तीन ते चार किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. वनविभाग किंवा या किल्ल्याची माहिती असलेल्या व्यक्तींना घेवून जाणे योग्य आहे.
जवळचे रेल्वेस्थानक - अकोला येथून 70 ते 75 किमी अंतरावर जळगाव जामोद आहे.
जवळचे विमानतळ - नागपूर येथून 320 किमी अंतरावर जळगाव जामोद आहे.
- विवेक चांदूरकर,
वाशिम
http://ekpravas.blogspot.com/2011/11/lonar.html
Lonar
Marthwada-Vidharbha
Circuit- 8 days, 1750 Kms
Pune-Ahmednagar-Parbhani- Navagarh-Jintur (480 Kms)
Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)
Karnja-Amravati--Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)
Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)
Type: Meteoritic Crater, Historical Place, Birding
Base Village: Lonar
Where: From Aurangabad its around 150 Kms. Nearest town is Sultanpur-14Kms
away. Alternatively it’s about 80 kms from Jintur if you are approaching from
Parbhani side.
Route: Jintur-Lonar
Time visited: October 2011
Time to see around: Half day atleast, Early morning are better
How to reach: From Jintur side there is a narrow but a good road to Lonar. You
approach the lake directly and MTDC resort is right in front of the crater
Lodging-Boarding facilities: MTDC and
1-2 hotels.
Guide: Available at rate of Rs 400+ at MTDC Resort
My Meter reading from Pune: 580 Kms
The unique crater lake formed by a meteorite impact over 55,000
years ago is second largest in the world formed on Basaltic rock! The Lake
water appears completely green and is saline in nature with PH value of 11.
The whole area is dotted with different kinds of herbs and
medicinal trees and the forest is thick as you go deep. A natural water springs
can be seen.
The place has historic angle as we find 9 temple built around it. Bagicha, Wagh, Mor, Kamalaja, Mahadeva, Mungda, Amarkhana, Deshmukh and Chopda. The other important temples are Gaimukh and Daitya Sudana. The temples are said to be built from 11-15th century.
You can climb down from MTDC resort. Only one temple is easily accessible from here in the jungle. If you want to take full tour around the crater then it can easily take up to 3/4 hours as the temples are scattered all around the rim.
If you are visiting early morning you could be greeted by hundreds of chirping birds. Unfortunately I was walking down in hot afternoon but still I could catch a glimpse of few birds like Ibis, ducks etc.
If you are luck you could find burnt out rock parts of meteorite. It appears like regular but a porous stone and which is very light in weight. It floats on water.
Dhara Mandir situated on the rim of the crater is also a historical monument and visited by several devotees every year. This can be easily accessed by road. A natural water flow is seen here continuously falling in the kund below.
Close by to the Ambar Lake is a nondescript little temple dedicated to Hanuman.
What is interesting is that the idol of the god is an actual piece of the metorite and for long its magnetic properties had fascinated the people who built a temple to house it.
Daityasudan temple built in the 10th century is a Khajurao style temple is truly worth seeing. Click here for details.
Daityasudan Temple Lonar
Marthwada-Vidharbha
Circuit- 8 days, 1750 Kms
Pune-Ahmednagar-Parbhani- Navagarh-Jintur (480 Kms)
Jintur-Lonar-Mehekar-Karanja (216 Kms)
Karnja-Amravati--Chikhaldara (153 Kms)
Chikhaldara-Partwada-Muktagiri (44Kms)
Chikhaldara-Semadoh-Chikhaldara (50Kms)
Muktagiri-Achalpur-Akot-Shegaon (120 Kms)
Shegaon-Mehekar-SindkhedRaja-Jalna-Aurangabad- (265 Kms)
Aurangabad-Nagar-Pune (236 Kms)
Type: Temple
Base Village: Lonar
Where: From Aurangabad its around 150 Kms. Nearest town is Sultanpur-14Kms
away. Alternatively it’s about 80 kms from Jintur if you are approaching from
Parbhani side.
Route: Jintur-Lonar
Time visited: October 2011
Time to see around: 1 hour
How to reach: It’s in the heart of the city.
Guide: Available at MTDC Resort
My Meter reading from Pune: 580 Kms
If you are on your own you may want to ask for "The old
stone temple" if you want accurate directions as lot of them are not aware
of its official name.
Daityasudan Temple dedicated to Vishnu dated to the Chalukya Dynasty. Built in Hemadpanthi style has plinth of 1.5 m in height.
All over the exterior wall it has beautiful scenes from Ramayana and Mahabharata.
Several exquisite figures of gods and goddess are seen.
The detailed carvings on the sides of an old entrance which was now locked.
Typically seen are several dancing poses and artistic ones like ‘shringar’.
There are several carvings similar to what is seen at Khajuraho temples.
The temple is very basic from inside. Area out-side the sanctum is dark and the ceiling reveals beautiful carvings under a torch light.
The idol of this temple is made of an ore with high metal
content and looks like stone.
बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती
http://diobuldana.blogspot.com/2021/03/blog-post_48.html
न्यु गद्रे
https://www.facebook.com/people/Lonar-Crater-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0/100064625564498/







































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.