Sunday, December 3, 2023

निष्काळजीपणा नकोच!

 

सकाळ साप्ताहिक

ओंकार ओक

उन्हाळ्याच्या सुट्या आणि ट्रेकिंचा सीझन येतो आहे. ट्रेकिंग करताना वाट चुकून, कुठून तरी पडून जबर जखमी होणं किंवा मृत्यू ओढावणं, सेल्फी किंवा साधा फोटो काढायच्या नादात कड्यावरून पाय घसरून अपघात होणं, मुख्य वाट सोडून शॉर्टकट घेण्याच्या अट्टहासामुळे पाय घसरणं वगैरे गोष्टी निष्काळजीपणामुळे सर्रास घडतात. नव्याण्णव टक्के अपघात माणसाच्याच चुकीमुळे होत असल्यानं यात ‘ट्रेकिंग हा अत्यंत रिस्की खेळ आहे’ या वाक्याला काहीही प्रमाण उरत नाही.

“सर माहुली किल्ल्याला एक ग्रुप चुकला आहे. गेले तीन तास त्यांचा काहीच पत्ता लागला नाहीये. प्लीज काही मदत पाठवता येईल का?”

“सर एका मुलाचा सेल्फी काढताना फॉल झालाय. वाचण्याचे चान्सेस काहीच नाहीयेत. त्याच्या ग्रुपची लोकं खूप घाबरली आहेत. प्लीज रेस्क्यू टीम पाठवता येईल का?”

सह्याद्रीतल्या गिर्यारोहणाशी संबंधित आपत्कालीन घटनांच्या मदत कार्यासाठी ‘रेस्क्यू को-ऑर्डिनेटर अर्थात बचावकार्य समन्वयक म्हणून गेली दहा वर्षं काम करत असताना असे फोन येणं यात आता काहीच नवीन उरलेलं नाही. साधारणपणे पावसाळ्याचा सीझन सुरू झाला की महिना दोन ते चार अपघात होणारच हे आता जणू दुर्दैवी समीकरण झालंय. रोजच्या कटकटीच्या रुटीनमधून दोन पळ विश्रांतीचे आणि समाधानाचे मिळावेत म्हणून नावाजल्या गेलेल्या गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग या खेळाला या अपघातांच्या रूपानं सध्या एक काळी किनार लाभली आहे आणि त्यामुळे नवख्या गिर्यारोहकांमध्ये साहसाची बीजं रोवताना कुठेतरी पुन्हा फिरून विचार केला जातो आहे. पण या सर्वांचं मूळ शोधताना अपघात का होतात आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल, हा ऐरणीवरचा प्रश्न मात्र जसाच्या तसा उरतो. इथं एक गोष्ट सुरुवातीलाच ठळकपणे सांगावीशी वाटते, ती म्हणजे सह्याद्रीत होणाऱ्या अपघातांमध्ये ट्रेकर्सचं प्रमाण बोटावर मोजण्याइतकं असून ह्या खेळाला अत्यंत ‘लाईटली’ घेणारे नवीन भटके किंवा सहलीसाठी आलेली अतिउत्साही मंडळी यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पण हे अपघात कुणाचे होतात यापेक्षा अपघात का होतात आणि ते टाळून गिर्यारोहण अधिकाधिक प्रगल्भ आणि संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयाचा धांडोळा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातून थोडासा करूया.

अपघात म्हणजे काय ?

खरं तर या शब्दाची व्याख्या परिस्थितिजन्य असून ती वस्तुनिष्ठ आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलं, तर मानवी निष्काळजीपणा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घडणारी अशी एखादी घटना, ज्या घटनेमुळे सुरळीत सुरू असलेल्या ट्रेक किंवा भटकंतीमध्ये अडथळा येऊन त्यामुळे अनेकदा जीवावर बेतू शकतं किंवा आणि त्यातून त्या भटकंतीला खीळ बसते, असं ढोबळमानानं म्हणता येईल. प्रत्येकवेळी अपघातात जीव जातोच असं काही नाही, पण तसं होण्याची परिस्थितीदेखील निर्माण होणे, यालाही एक प्रकारचा अपघात म्हणता येऊ शकतो. सुतासारख्या सरळ सुरू असलेल्या ट्रेकमध्ये आपण कल्पनाही केलेली नसते अशी एखादी घटना घडते आणि त्याचा सहभागी ट्रेकर्सच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. परिस्थितीचं गांभीर्य हासुद्धा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगला अनुभव असेल तर अशी परिस्थिती डोकं शांत ठेवून हाताळता येऊ शकते आणि त्यावर मार्ग निघू शकतो. साधी वाट चुकण्यापासून ते अगदी मृत्यू होण्यापर्यंत अशा दुर्दैवी घटनांची मालिकाच अनेकदा पाहायला मिळते आणि त्या ट्रेकला आणि परिणामी पुढचे काही दिवस संपूर्ण गिर्यारोहण विश्वाला त्याच्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

अपघात का होतात ?

प्रत्येक अपघाताच्या मुळाशी जाऊन कारणांचा खोलवर विचार करणं, हा सर्व ट्रेकर्स मंडळींचा स्थायीभाव. सह्याद्रीतल्या अपघातांच्या बाबतीतही हे अगदी तंतोतंत लागू होतं. त्यामुळे अपघात कसे टाळावेत या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी अपघात होण्याची कारणं काय आहेत, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. अगदी वैयक्तिक मत द्यायचं झालं, तर अपघातांची कारणं खालीलप्रमाणे सांगता येतील –

  • निष्काळजीपणा ः सह्याद्रीतल्या अर्ध्याहून जास्त अपघातांची सुरुवात ही याच एका कारणामुळे होते. याची सुरुवात होते ती आपण जात असलेल्या ठिकाणाची शून्य किंवा अगदी अपुरी माहिती असणं. ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ हे ह्या निष्काळजीपणाचंच सख्ख भावंडं! ‘जाऊ रे आपण, काही होत नाही’ ह्या वाक्याचा जन्म झाला म्हणजे समजावं की पुढे काहीतरी अघटित वाढून ठेवलं आहे. सह्याद्रीमध्ये ‘गाइड’ हा पाठीच्या कण्यासारखी भूमिका असलेला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सोबतीला गाइड न घेता ट्रेक करणं हे आजकाल भूषणावह समजलं जातं. अत्यंत नवख्या ठिकाणी जातानाही स्वतःचे स्वतः मार्ग शोधण्याकडे नवख्या ट्रेकर्सचा कल असतो, आणि हा केविलवाणा प्रयत्न करत असतानाच अत्यंत वाईटरितीनं वाट चुकून ट्रेकची माती होते. पूर्वी गिर्यारोहण प्रगत झालेलं नसताना गाइडला द्यायची बिदागी हा खिशाला न परवडण्यासारखा विषय असल्यानं तेव्हा स्वतःच वाट शोधण्यावर आणि ती न सापडल्यास परत फिरण्यावर जास्त भर दिला जात असे. पण सध्या फेसबुक, इन्स्टाच्या जमान्यात ‘सेल्फ एक्स्प्लोरेशन’च्या वायफळ हव्यासापायी वाट चुकून अपघाताला निमंत्रण दिलं जातं. या मंडळींकडे अनेकदा ‘सर्व्हायव्हल’ची अत्यंत अपुरी सामग्री असल्यानं परिस्थिती अजूनच बिकट होते. अशातच मोबाईलला रेंज नसणं, खूप फोटो-व्हिडिओ काढल्यामुळे गरजेच्यावेळीच फोनमध्ये बॅटरी उरलेली नसणं, आपण नक्की कुठं अडकून बसलोय हे लोकेशनच माहीत नसणं इत्यादी प्रकार दुष्काळात तेरावा महिना म्हणून समोर येतात.

पण हा निष्काळजीपणा फक्त वाट चुकण्यापर्यंतच मर्यादित नसतो. वाट चुकून कुठून तरी पडून जबर जखमी होणं किंवा मृत्यू ओढावणं, सेल्फी किंवा साधा फोटो काढायच्या नादात कड्यावरून पाय घसरून अपघात होणं, मुख्य वाट सोडून शॉर्टकट घेण्याच्या अट्टहासामुळे पाय घसरणं वगैरे गोष्टी सर्रास घडतात. यात नव्याण्णव टक्के अपघात माणसाच्याच चुकीमुळे होत असल्यानं यात ‘ट्रेकिंग हा अत्यंत रिस्की खेळ आहे’ या वाक्याला काहीही प्रमाण उरत नाही. अनेकदा इतर लोकांना आपला फिटनेस दाखवायच्या नादात एका दमात एखादा किल्ला किंवा घाटवाट चढून जाणं, पाणी न पिता कित्येक किलोमीटर अंतर चालणं, दम लागल्यावर थांबल्यास बदनामी होईल या वायफळ समजुतीमुळे शरीराची क्षमता संपुष्टात आलेली असतानाही फक्त ‘पीअर प्रेशर’मुळे स्वतःची फरपट करत राहणं, गरज असलेल्या ठिकाणी रोप न वापरणं, ऋतूनुसार ट्रेक न करणं (उदाहरणार्थ, मोरोशीचा भैरवगड पावसाळ्यात करणं किंवा वजीर सुळका फ्री क्लाइम्ब करणं वगैरे) या सगळ्या गोष्टी अपघातांना निमंत्रण देतात. प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ऋतूला वैयक्तिक क्षमता अत्यंत वेगळी असते, हा मुद्दा विसरून चालत नाही. भर उन्हात न थकता ट्रेक करणाऱ्या ट्रेकरला एखाद्या कातळटप्प्यावर मदतीची गरज भासूच शकते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला बायपास सर्जरी किंवा ब्रेन ट्रान्सप्लान्टचं ऑपरेशन करता येईल का? हेच तत्त्व इथं लागू होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात, हे ओळखणं आणि त्यानुसार कोणाचंही खच्चीकरण न करता ती परिस्थिती व्यवस्थित हाताळणं योग्य असतं. त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या चुकीलाच निष्काळजीपणा म्हणता येईल आणि हा आपल्याकडून कधी घडल्यास त्यातून योग्य तो बोध घेऊन पुढच्यावेळी ती चूक कटाक्षानं टाळणं यातच सर्वकाही आलं.

  • नैसर्गिक आपत्ती ः अपघाताच्या या प्रकारात मानवी चुकीला काहीही स्थान नसावं. जिथून दरवर्षी हजारो लोक जातात, त्या एखाद्या कड्याखालून नेमकं आपणच जाताना त्या कड्यातला एक मोठा दगड निसटून आपल्यावर पडला तर त्याला पूर्णपणे नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल. नैसर्गिक आपत्ती किंवा ‘ॲक्ट ऑफ गॉड’ या पद्धतीत मोडणारे अपघात हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणाच्या बाहेरचे असल्यानं यात अनुभवी किंवा नवखा असा भेदभाव करता येत नाही. अनेकदा एखादी आडवी वाट ओलांडताना पुढचे दहा जण एखाद्या पक्क्या दगडावर पाय ठेवून पुढे गेलेले असताना अकराव्या गड्यानं त्याच दगडावर ठेवलेला पाय त्याच्या वजनामुळे म्हणा किंवा अजून कोणत्या कारणामुळे का होईना पण तिथून निसटतो आणि गंभीर अपघात होतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघातांमध्ये दोषारोप करायला वाव नसतो आणि हळहळण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.
  • चुकीची माहिती / निष्काळजीपणे दिलेली माहिती ः हा आजकाल नव्यानंच उदयाला आलेला प्रकार आहे. अनेकदा लेख लिहिताना, ब्लॉग लिहिताना किंवा तोंडी माहिती सांगताना चार गोष्टी वाढवून सांगण्याकडे कल दिसून येतो. म्हणजे एखाद्या अत्यंत अवघड असलेल्या टप्प्यालासुद्धा रोपची गरज नाही असं सांगणं किंवा जो ट्रेक फक्त हिवाळ्यातच करण्यासारखा आहे त्याला ‘जा रे भर पावसात, काही होत नाही’ अशी माहिती दिल्याचे अनेक दाखले आहेत. इथं एक गोष्ट कटाक्षानं लक्षात घेतली पाहिजे, की तुमचा अनुभव आणि तुम्ही ज्याला सांगताय त्याचा अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. दुसरं म्हणजे तुम्ही ट्रेक केलात त्यावेळची परिस्थिती आणि ही व्यक्ती जाईल तेव्हाची परिस्थिती यातही तफावत असू शकते. तुम्हाला एखादा किल्ला किंवा ठिकाण किंवा घाटवाट सोपी वाटली म्हणजे ती समोरच्यालाही तितकीच सोपी जाईल याची खात्री देता येते का? एखादा कातळटप्पा तुम्ही लीलया चढून जाता, तोच टप्पा समोरच्याला दरीत लोटून देऊ शकतो, याचा विचार निक्षून व्हायला हवा. त्यामुळे कोणतीही माहिती देताना अतिशय ग्राउंड लेव्हलला जाऊन वस्तुनिष्ठ पद्धतीनं सांगावी, कारण ती माहिती ऐकणारा पूर्णपणे तुमच्यावर विसंबून असतो हे विसरता कामा नये.

अपघातानंतरची परिस्थिती आणि रेस्क्यू यंत्रणेवर पडणारा ताण

सह्याद्रीतल्या सध्याच्या वाढत्या अपघातांना सामोरं जाताना एक रेस्क्यू समन्वयक म्हणून आजवर अनेक भल्याबुऱ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. अपुऱ्या माहितीमुळे लोकेशनपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अनंत अडचणी ते अगदी रेस्क्यू केलेल्या लोकांकडून रेस्क्यू टीमना मिळालेली दुय्यम दर्जाची आणि घृणास्पद, अपमानकारक वागणूक इथपर्यंत अनेक प्रसंग अनेक रेस्क्यू टीमनी आणि आम्ही को-ऑर्डिटरनी अनुभवले आहेत. अर्थात बचावदलाच्या अनंत कष्टांची जाणीव ठेवून मनापासून कृतज्ञता ठेवणारे लोकही आहेत, पण त्यांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. रेस्क्यू करणं ही त्या टीमची जणू काही सरकारनं नेमून दिलेली जबाबदारी आहे आणि ते आपल्या मदतीला धावून आले यात त्यांनी खास असं काय केलं, असं बोलून दाखवणारे महाभागही आम्हाला भेटलेले आहेत. मागच्या पावसाळ्यात पेब किल्ल्याला साधी पाण्याची बाटलीसुद्धा घेऊन न गेलेला एक ग्रुप गडावर जाताना इतक्या वाईट पद्धतीनं रस्ता चुकला की ते पेबऐवजी भलत्याच डोंगरावर जाऊन पोहोचले. मदतीसाठी त्यांचा मला फोन आल्यावर मी एका रेस्क्यू टीमला संपर्क करून त्यांच्या काही सदस्यांना या मुलांच्या मदतीसाठी जाण्याची विनंती केली. त्या रेस्क्यू टीमच्या शिलेदारांनी या ग्रुपला सहीसलामत बाहेर काढलं. मी त्या ग्रुपला जेव्हा संध्याकाळी परत फोन केला तेव्हा त्यांचं, ‘उन्होंने इतना क्या बडा काम किया है? इट वॉज देअर ड्युटी. उस में बोल के दिखाने की क्या जरूरत है?’ हे वाक्य सगळ्या पडद्यांची चिरफाड करून त्यांचं निष्काळजीपणाचं आणि बेमुर्वतखोरपणाचं खरं चित्र समोर आणणारं होतं. मित्रांनो आज लोणावळ्याची ‘शिवदुर्गमित्र’, पनवेलची ‘निसर्गमित्र’, नाशिकची ‘वैनतेय’, महाबळेश्वरची ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ आणि ‘सह्याद्री रेस्क्यू फोर्स’, साताऱ्याची ‘शिवेंद्रराजे ग्रुप’ या आणि यांसारख्या अनेक संस्था ग्राउंड लेव्हलला जाऊन पूर्णपणे विनामोबदला हे आभाळाएवढं काम गेली कित्येक वर्षं करत आहेत. स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून आणि वेळप्रसंगी वैयक्तिक कारणं, नोकऱ्या, व्यवसाय बाजूला ठेवून हे शिलेदार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाट्टेल त्या परिस्थितीमध्ये धावून जातात आणि त्या बदल्यात त्यांना कौतुकाचे किंवा कृतज्ञतेचे चार शब्द पण ऐकायला मिळू नयेत, इतका निर्लज्जपणा लोकांमध्ये येतो तरी कुठून? आज या सर्व रेस्क्यू ग्रुपना ना कोणतं सरकारी अनुदान मिळतं, ना खासगी स्पॉन्सरशिप, ना कुठे कौतुकाचे चार शब्द, ना कोणता कार्यसन्मान. पण तरीही या सर्व टीमचं कार्य आजतागायत अविरत सुरू आहे. कुठंही जाऊन अडकायला काही लागत नाही, पण ती परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळून अडकलेल्या लोकांना सहीसलामत परत आणणं यातच खरं शौर्य असतं हा मुद्दा नाकारून चालणारच नाही. स्थानिक पातळीवर आज हरिश्चंद्रगडचा आपला भास्कर बादड, माहुलीचं आगीवले कुटुंब, राजगड पायथ्याच्या गुंजवणे गावातले बाळकृष्ण रसाळ, बेलपाड्याचे कमा व कमळू पोकळे यांसारखे अनेक लोक निःस्वार्थ वृत्तीनं या सर्व बिकट समयी मदत करताहेत आणि त्यांचे अनंत उपकार ट्रेकर कम्युनिटीवर आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे अपघात झाल्यावर रेस्क्यू टीमनं केलेल्या मदतीची जाण ठेवून त्याची परतफेड जरी नाही करता आली, तरी त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवणं यातच एका अस्सल भटक्याची खरी ओळख आहे.

रेस्क्यू व रिकव्हरी यातला फरक

सर्वसाधारणपणे आपण सर्वच बचावकार्यांना रेस्क्यू हे नाव देऊन मोकळे होतो. पण जिवंत व्यक्तींना सहीसलामत बाहेर काढणं याला रेस्क्यू असा शब्द आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढणं याला रिकव्हरी म्हटलं जातं. ह्या निमित्तानं हा फरकही स्पष्ट करावासा वाटतो.

अपघात होऊ नये म्हणून काय करावे

  • सर्वात आधी जात असलेल्या ठिकाणाची संपूर्ण माहिती तिथं जाऊन आलेल्या व्यक्तीकडून जाणून घ्यावी.
  • ज्या ठिकाणाचा जो योग्य सीझन आहे, त्याच सीझनला जावं.
  • गाइड घेण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात ठेवावं आणि स्थानिक माणूस कायम बरोबर ठेवावा. लक्षात ठेवा, चुकून एखादी दुर्घटना घडल्यास हीच व्यक्ती तुमच्यासाठी देवासारखी धावून येते.
  • गिर्यारोहणाची किमान बेसिक सामुग्री बरोबर ठेवावी.
  • डोंगरांचा मान ठेवावा व त्यांना गृहीत धरू नये.
  • सर्वतोपरी काळजी घेऊनही अपघात झालाच तर
  • शक्यतो गांगरून न जाता स्वतःवर संयम ठेवावा व ग्रुपमधील इतरांना परिस्थितीची जाणीव करून द्यावी.
  • लवकरात लवकर किल्ल्याचा किंवा त्या ठिकाणाचा पायथा किंवा जवळचं गाव गाठून स्थानिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा.

नेटवर्क मिळाल्यास तातडीनं रेस्क्यू टीमला पाचारण करावं व हे करताना एक गोष्ट निक्षून लक्षात घ्यावी की एकाच वेळी पोलिस किंवा अनेक रेस्क्यू टीमना संपर्क करू नये. याचं कारण त्यांच्यात योग्य तो समन्वय न झाल्यास गोंधळ निर्माण होऊन परिस्थिती अजून बिघडू शकते.

  • याच्याशी संबंधित एक किस्सा जाता जाता पटकन सांगतो. एका किल्ल्यावर अडकलेल्या काही मुलांनी एकाच वेळी चार रेस्क्यू टीमना फोन करून आपण अडकल्याची माहिती दिली. यातल्या प्रत्येक रेस्क्यू टीमला आपण सोडून इतरसुद्धा रेस्क्यू टीमना बोलावण्यात आलंय हे अर्थातच माहीत नव्हतं. त्यापैकी एक रेस्क्यू टीम किल्ल्याच्या एका पायथ्याकडून चढून वर आली व त्यांनी त्या मुलांची सुटका करून त्यांना खाली उतरवलं. पण त्याच वेळी याच मुलांची सुटका करायला किल्ल्याच्या पलीकडच्या पायथ्याच्या गावातून चढून आलेल्या अजून एका रेस्क्यू टीमला ही मुलं दिसलीच नाहीत. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आणि मुलांचं शोधकार्य सुरू झालं. मोबाईलला नेटवर्क नसल्यानं अर्थातच संपर्क होईना. शेवटी हाती काहीच न लागल्यानं दुसरी रेस्क्यू टीम थकूनभागून खाली परत आली आणि त्यांना दोन दिवसांनी खरी परिस्थिती कळली. त्यामुळे भावनेच्या भरात चार-चार रेस्क्यू टीमना संपर्क करून गोंधळ वाढवू नये व काहीच सुचत नसल्यास पोलिसांना फोन करावा.अपघात झालेल्या व्यक्तीला कधीही स्वतःहून दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये.
  • वाट चुकल्यास व शोधकार्यासाठी रेस्क्यू टीमला बोलावलं असल्यास ते लोक येईपर्यंत आहे तिथंच शांतपणे बसून राहावं, कारण तुम्ही त्यांना जर तुमचं गुगल लोकेशन दिलेलं असेल आणि ते येईपर्यंत स्वतः वाट शोधण्याच्या नादात तुम्ही भरकटलात तर रेस्क्यूच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.
  • सोशल मीडियावर कुठंही आपण अशा परिस्थिती अडकलो आहोत याचे स्टेटस वगैरे अपडेट करू नयेत. अगदीच काहीच मार्ग उपलब्ध नसल्यास शेवटचा उपाय म्हणून हे सगळं करणं ठीक आहे, पण आधी वर दिलेले मार्ग वापरावेत.परिस्थिती स्वीकारावी व शांत डोक्यानं मार्ग काढण्याकडे कल ठेवावा.मित्रांनो गिर्यारोहण हा अतीव आनंद देणारा, तसंच निसर्गाचा आत्मा आणि माणसाचं मन एकरूप करणारा नितांतसुंदर प्रकार आहे. त्याचा सुरक्षितपणेच स्वीकार करण्यातच खरं गम्य असतं. एक छोटी चूक आपल्या आयुष्यभराच्या भटकंतीसाठी स्पीडब्रेकर म्हणून काम करू शकते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा साकल्यानं विचार करून व्यवस्थित वेळ देऊन भटका आणि लवकरच आपली भेट डोंगरात होईल अशी सह्याद्रीचरणी प्रार्थना करूया!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...