भाग १ » माझी लेखमाला
वर्ष १९८१. नुकतीच बी. एस्सी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. दुपारपासून गच्चीवर क्रिकेट खेळून दमलो होतो. संध्याकाळी अंधार पडल्यावर नाईलाजाने क्रिकेट बंद करून आम्ही काही मित्र पाण्याच्या टाकीवर बसून थंड हवा खात गप्पा मारत बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सहा महिन्यांपूर्वीच १९८०चे मॉस्को ऑलिम्पिक संपन्न झाले होते. ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू कसे कसब दाखवायचे. त्या रोमानिया तसेच बल्गेरिया, झेकोस्लोव्हिया, युगोस्लोव्हिया इत्यादि कठीण उच्चारांची नावे असलेल्या देशांचे खेळाडू वैयक्तिक कामगिरी करून कसे पदक पटकावतात हा विषय निघाला.
” ते खेळाडू खूप कष्ट आणि मेहनत करतात. त्यांचा सराव खूपच कडक असतो”, एकजण म्हणाला.
“हो, पण त्यांचे सरकार त्यांची खूप काळजी घेते, त्यांना सर्व साधने आणि सवलती पुरविल्या जातात”, दुसरा एकजण म्हणाला.
“अरे ते तर जाऊ दे, त्यांना लहानपणापासूनच खेळासाठी तयार केले जाते”, अजून तिसरा एकजण म्हणाला.
असा फार मोठ्या गहन विषयावर वाचाळपणा सुरु होता.
त्यावर
एकाने अजून विषय पुढे नेला, “अरे, त्या जापान, जर्मनी आणि युरोप मधले लोक
कसे एकेक विक्रम करत असतात. कोणी सायकलवर देश फिरतात, कोणी उलटे चालत
फिरतात. काही जण तर चालत जग फिरतात. आणखी कायकाय करतात ते लोक, हल्ली
टीव्हीवर दाखवतात ते सगळं. अन आपल्याकडे काय कोण करत नाही, आपल्या लोकांना
नाय येत तसे काही”. काही जण त्याला अनुमोदन देत होते.
एवढा वेळ मी सर्वांचे ऐकून घेत होतो. पण हे शेवटचे वाक्य ऐकल्यावर मात्र
मला राहावले नाही. “अरे, दुसऱ्याचं कशाला सांगता तुम्ही. तुमच्या हिम्मत
आहेत का तसे काही करायची? तुम्ही का नाही करत तसे काही?” मी ओरडलो.
सगळे चूप.
“अरे, पण आपण कुठे काय करू शकतो? आपल्याला काय येतंय?”, एकजण म्हणाला.
पण
मी जरा पेटलो होतो, “नसुदे काही येत आपल्याला. ते उलटे चालतात, पण
तुम्हाला सरळ तर चालायला तर येतं ना? मग आपण तेवढे तरी करु शकतो कि नाही?”
“म्हणजे काय करू शकतो?”
” हे बघ, ते पायी जग फिरतात ना?, मग आपण लांब नको, पण मुंबई ते पुणे (Mumbai to Pune by Feet) चालत जाऊ”.
मी जरा जास्तच पेटलो होतो, ” मला लोकांचे नका सांगू तुम्ही आता, तुम्ही कोणकोण पुण्यापर्यंत चालत जाऊ शकता ते सांगा पहिलं?”.
सगळे परत चिडी चूप.
“अरे सोड ना विषय, आपल्याला नाही जमणार ते, कोणी नाही जाणार पुण्याला चालत”, एकाने माघार घेतली.
“स्वतःला नाही जमत म्हणून दुसरे कोणी करू शकणार नाही असे नसते, उगाचाच नावे नका ठेवू आपल्या देशातील लोकांना”. मी म्हणालो.
आता, माझा असा स्वभाव सर्वांना माहीतच होता. म्हणून सर्वांनी माघार घेतली व चूप झाले.
पण
मी तर पुरता पेटलो होतो, “हे बघा, तुम्हाला जमणार नसेल, तर हरकत नाही, पण
मी आता ठरवले, मी पुण्याला चालत जाणार”. असे बोलून मी एखाद्या सेनापतीसारखा
स्वतःच्याच मनाने स्वतःच्याच पैजेचा विडा स्वतःच उचलला.
आणि गरजलो, “तुमच्या पैकी कोण माझ्या बरोबर पुण्यापर्यंत चालत येणार ते सांगा”.
एखादं कुत्र्याचं पिल्लू घाबरून खाली मान घालून कसे मागे मागे जाते तसे, एकएक जण करू लागला.
पण एक वीर जवान पुढे आलाच. “चारू, तू खरोखर जाणार पुण्याला चालत?” प्रमोदने मला विचारले.
“हो मी नक्की जाणार, कोण सोबत नाही आले तरी एकटा जाणार”, जसा विरोध वाढू लागला तसा माझा निश्चय पक्का होत चालला.
प्रमोद पण पेटला, “तू जाणार, तर मी पण येणार तुझ्याबरोबर. आपण दोघे जाऊ पुण्याला चालत”.
अशा
तऱ्हेनं मुंबई ते पुणे पायी चालत जाण्याचा उपक्रम मी आणि प्रमोद राऊत असे
आम्ही दोघेजण करणार असे मी तिथल्या तिथे रात्रीच्या अंधारात पाण्याच्या
टाकीवर बसून जाहीर केले.
घरची परवानगी मिळवली
मुंबई ते पुणे पायी जाण्याचा हा निर्णय आम्ही घरी न विचारता किंवा चर्चा न करताच परस्पर घेतला होता. मला माझ्या घरच्यांची परवानगी मिळणार ह्याची मला खात्री होतीच. पण आमचे दादा म्हणजे माझे वडील गावाला गेलेले होते. ते उद्या परवा येतील मग त्यांना सांगून टाकू आणि मग पुढच्या तयारीला लागू असे मी ठरवले. प्रमोदने सुद्धा घराची परवानगी मिळण्याची खात्री दिली, आणि गरज वाटली तर त्याच्या घरच्यांना पटवायची जबाबदारी माझ्यावर टाकली. बाकीच्या मित्रांनी “बघा हं, विचार करा पुन्हा. पुणे काही जवळ नाहीय. त्रास होईल. तुम्हाला काय झालं तर?” अशा प्रकारे बोलून, समजावून मला ह्या उपक्रमापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या स्वभावाप्रमाणे मला जितका जास्त विरोध होई, तितका माझा निश्चय अजून पक्का होई.
गच्चीवरून खाली घरी आलो. अन पाहतो तर काय? वडील गावावरून परत आलेले होते अन अंघोळ करत होते.
मी बाहेरूनच वडिलांना सांगीतले, “दादा, मला पैसे लागतील”.
त्यांनी विचारले “कशाला?”
मी, “पुण्याला चालत जायचंय”.
“अरे, मग चालत जायला पैसे कशाला लागतात”, वडील अजून माझ्या पुढचे होते.
“दादा, चालायला पैसे नकोत, वाटेत काही खायला प्यायला, खर्चायला लागेल ना”.
वडील म्हणाले , “थांब जरा, नंतर बोलू”.
अंघोळ करून वडील बाहेर आल्यावर मी माझी योजना आई वडिलांना सांगितली. त्यांनी लगेच होकार दिला. काहीही प्रश्न विचारले नाही मला. वडिलांनी पन्नास रुपये देण्याचे कबूल केले.
“पुण्यात आपले काही नातेवाईक आहेत. त्यांची मदत मिळेल, आपण त्यांना पत्र टाकूया” असे वडील म्हणाले.
प्रमोद राऊत हा पहिल्या मजल्यावर राहायचा आणि मी दुसऱ्या. माझ्या घरून संमती मिळाल्यावर मी लगेच त्याच्या घरी जाऊन सर्व बेत सांगितला. मी सोबत आहे म्हटल्यावर त्याच्या घरूनही फारशी आडकाठी झाली नाही. प्रमोद हा स्काउटचा विद्यार्थी. माझ्यापेक्षा वयाने आणि उंचीने लहान. पण अंगाने दणकट. (त्याचे टोपण नाव शिंदोड होते, त्याचा अर्थ मला अजूनही माहित नाही). लगेचच आमच्या मित्रांना आम्हाला घरून परवानगी मिळाली हे सांगितले. आमचा पुण्याला चालत जाण्याचा बेत हाणून पाडणे हे माझ्या आईवडीलांच्याच हातात होते, त्यावर सर्वांची भिस्त होती. पण त्यांनीच परवानगी दिली म्हटल्यावर मित्रांचा नाईलाज झाला. उगीच गच्चीवर काहीतरी बोलून ह्याला डिवचला अशा अपराधी भावनेने माझे मित्र दुःखी झाले आणि ह्या दुःखाच्या भरात सर्व मित्रांनी “चारु आणि शिंदोड पुण्याला चालत जाणार” हि बातमी रात्री उशिरापर्यंत अख्ख्या चाळीत पोहोचवली आणि मगच हलक्या मनाने झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी चाळीत सगळीकडे चर्चा. आमच्या कार्यक्रमाचे पुढारीपण माझ्याकडे आपोआपच आले होते. म्हणून जो भेटेल तो मला अधिक माहिती विचारी. मी नंतर सांगतो असे म्हणून वेळ निभावायचो.
खरेतर आम्ही फक्त “मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) चालत जाणार आणि परत पुणे ते मुंबई चालत येणार” एवढेच ठरवले होते. पण मी किंवा प्रमोद दोघांनीही पुणे कुठे असते आणि कसे दिसते हे या अगोदर पहिलेच नव्हते. आमच्या गावी जाणारी एसटी बस लोणावळ्याच्या पुढे डावीकडे वळून तळेगाव मार्गे राजगुरुनगरच्या दिशेने जात असे. त्या ठिकाणाचा रस्ता सरळ पुण्याला जातो. एवढीच माझी पुण्याची माहिती! आणि प्रमोद हा कोकणातला, त्यामुळे त्यानेही पुणे हे फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकातच वाचलेले. मुंबई ते पुणे हे रस्त्याने किती किलोमीटर अंतर आहे हे देखील माहित नव्हते. (नंतर लक्षात आले, कि हे अंतर ठाऊक असते आणि रस्त्यातील गावांची नावे माहीत असती तर वेळ आणि वेग यांचे गणित बसवता आले असते). त्यामुळे पुण्याला कसे जायचे ह्याचा अभ्यास आम्ही प्रथम सुरु केला. त्यावर एकेकाने वेगवेगळा सल्ला द्यायला सुरुवात केली. दुर्देवाने मुंबईहून पुण्याला जाण्याकरिता केवळ दोनच मार्ग होते. म्हणून जास्त सल्ले मिळू शकले नाहीत. मला ठाणे-मुंब्रा मार्गे पनवेल-लोणावळा हा मार्ग आमच्या गावाच्या एसटी बसमुळे माहीत होता. पण वाशीच्या खाडीपूल मार्गे नवीन रस्ता सुरु झालेला आहेत, त्याने गेला तर तुमचे खूप अंतर वाचेल असे बऱ्याच जणांनी सांगितले.
मार्गदर्शन
आता हा वाशीचा पूल कुठे लागतो हे विचारल्यावर काही जणांनी मला लगेच चाळीच्या गच्चीवर नेलं. गच्चीवरून साधारण उत्तर पूर्व दिशेला दूरवर दिसणाऱ्या द्रोणागिरीच्या डोंगराच्या रांगेकडे बोट दाखवून हातवारे करून सांगितले. “पहिलं सरळ दादरला जायचं, तेथून पुढे सरळ सायन-चेंबूर मार्गे मानखुर्दच्या पुढे ह्या डोंगराच्या अलीकडे मोठी खाडी लागेल, खाडीवर नवीन मोठा पूल बांधला आहे. खाडी ओलांडली की वाशी, नंतर उजवीकडे वळून त्या डोंगराच्या खालून रस्ता जातो. अन त्या डोंगराच्या पलीकडे गेलात कि मग पनवेल लागतं. एकदम शॉर्टकट आहे”. असे अभिनव पद्धतीने खरोखरचे मार्गदर्शन केले.
अन मी पण फसलो त्या मार्गदर्शनाने. मनात म्हटले, “अरे, हे तर चांगलेच झाले. डोंगर तर जवळच दिसतोय. अन डोंगर ओलांडला कि पनवेल. खरंच खूप अंतर वाचेल. ठाणे-मुंब्रा मार्गे पनवेलला जायला मोठा वळसा घालावा लागणार, त्यापेक्षा हे बरंय!” अशा तऱ्हेने कुठल्या मार्गाने पुण्याला जायचं ते गच्चीवर उभ्याउभ्याच ठरवले. तीन दिवसात दरमजल करून आम्ही पुण्याला पोहोचू हे पण नक्की केले.
खरेतर माझ्या वडीलांना सर्व माहीत होते. पण त्यांनी आम्हाला फार काही न सुचविता, “न घाबरता तुम्हाला जसे जमेल तसे करा”, असे सांगितले होते. (खरेतर हि जगणे शिकविण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी वापरली होती).
पूर्वतयारी
आता नवीन प्रश्न निर्माण झाला.
“अरे, तुम्ही असे दोघेच रस्त्याने
जाणार, तुमची ना ओळख ना पाळख. मग तुम्हाला कोण ओळखणार आणि मदत करणार?
तुम्हाला कोणी चोर म्हणून पकडले तर?” असे नाना प्रश्न विचारले.
प्रश्न बरोबर होता, अन माझ्याकडे उत्तर नव्हते. मग एकाने सुचविले, “आपल्या विभागातील मान्यवरांकडून तुमची ओळखपत्र बनवून घेवू”.
मग मुंबईचे महापौरपद दोन वेळा भूषविलेले स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांचे नाव कोणीतरी सुचवीले. त्यांची मुले सेवादलाच्या माध्यमातून माझ्या ओळखीची होती. त्यांच्या मार्फत राजाभाऊ चिंबुलकर यांची भेट घेतली. आमचा मुंबई ते पुणे (Mumbai to Pune by Feet)पायी जाण्याचा उपक्रम त्यांना सांगितला. त्यावर त्यांनी आनंदाने आमच्यासाठी ओळखपत्र वजा शिफारसपत्र लगेचच स्वतःहून टाईप करून दिले व आम्हाला शुभेच्छा दिल्या. आमच्याच चाळी समोरील शिवसेना शाखा क्र. ६ चा मी धडाडीचा अर्धवेळ कार्यकर्ता होतो. त्यावेळेचे शाखाप्रमुख श्री. विजय पाटकर यांनी आमच्या उपक्रमाचे कौतुक करून आम्हाला शिफारसपत्र लिहून दिले. आणि कुठेही काही अडचण आली तर स्थानिक शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिक म्हणून ओळख सांगायची आणि हे पत्र दाखवायचे, तुम्हाला सर्व मदत मिळेल असे सांगितले. आणि खरोखरच त्या दोन्ही पत्रांमुळे आम्हाला खूपच फायदा झाला.
माझ्याकडे शाळेत असताना वापरायचो ते नारंगी रंगांचे रेक्झिनचे दप्तर होते. चार पाच वर्षाने ते बाहेर काढले. चर्मकाराकडून त्यांचे बंद, पट्टा वगैरे शिवून घेतल्या. त्याकाळी आजच्या सारख्या सॅक मिळत नसत. प्रमोदने सुद्धा त्याचे खादीचे दप्तर बाहेर काढले. त्याच्याकडे स्काऊटचे कॅनव्हासचे बूट होते. माझ्या कॅनव्हासच्या बुटावर प्रयोगशाळेत ऍसिड पडल्यामुळे त्याला भोक पडले होते. त्यावर माझ्या जुन्या कॉड्रा जीन्स पॅन्टीचा सुमारे दीड इंचाचा गोलाकार भाग कापून फेविकॉलने चिटकवला. एकाच बुटावर तो गोल तुकडा बरा दिसेना, म्हणून दुसऱ्या बुटावर पण विरुद्ध बाजूला दुसरा गोल चिटकवला. निळ्या कॅनव्हासच्या बुटावर ते लाल रंगाचे गोल छान दिसायचे. आमच्या घरून रस्त्यात खाण्यासाठी थोडे पदार्थ बनवून दिले होते. दोन-तीन शर्ट पॅन्ट, एक चादर, एक नोंद वही, पोस्टकार्डे, पेन, पाण्याची बाटली असे मोजकेच समान सोबत घेतले होते.
प्रमोदची ताई हॉस्पिटलमध्ये नर्स होती. तिने एक काचेची बाटली भरून एक औषध दिले, “पाय दुखले कि हे लावा’, असे सांगितले. मी त्या औषधाचा वास घेवून पहिला, आयोडेक्स सारखा वास आला. पण त्या औषधाने तर नंतर चमत्कारच घडवला. काही गोळ्या पण तिने दिल्या.
अशा तऱ्हेने आमची निघायची पूर्वतयारी झाली. तारीख ठरली १७ मे १९८१ रोजीची. आमच्या नातेवाईकांना पत्रे लिहून आम्ही तीन दिवसात पुण्याला पोहोचत आहोत, असे कळविले होते.
आणि तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आमची मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) पदयात्रा सुरु होणार होती. सकाळी सकाळी प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो.
मुंबई-पुणे प्रवास ( Mumbai to Pune by Feet ) – भाग १ समाप्त.
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली …. ते वाचा पुढच्या भागात.
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा (Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १) – लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९
मुंबई पुणे पदयात्रा : भाग २ वाचा

मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग २
प्रवासास सुरुवात
आणि १७ मे १९८१ रोजीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे किंवा साधारण ६ वाजता प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो होतो. पण उठून आवरायलाच उशीर झाला. सर्व उरकल्यावर प्रथम देवाच्या आणि नंतर आईवडिलांच्या आणि शेजारील काही वडीलधाऱ्यांच्या पाय पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकले. तोच समोरचा रमेश कलव पुढे आला. मला म्हणाला, “चारू, जाशील ना बरोबर? जमेल ना तुला?” त्याच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवत होती. मी म्हणालो, ” हो जाऊ आम्ही बरोबर, नको घाबरू”. खरेतर रमेशच्या ह्या वागण्याचे मला आश्र्चर्य वाटले होते. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्यांना तो त्रास द्यायचा. आमची नेहमी भांडणे आणि झटापटी व्हायच्या. आणि आता तो माझी काळजी करतो म्हटल्यावर, मलाच त्याची काळजी वाटू लागली. पहिल्या मजल्यावर प्रमोद तयारच होता. त्याच्याही घरी जाऊन निरोप घेतला. आम्हाला निरोप देण्यासाठी चाळीतले पंचवीस एक जण खाली उतरले होते. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. येथूनच आम्हाला निरोप द्या असे मी सर्वांना सांगितले. आम्हाला निरोप आणि शुभेच्छा देण्याकरिता चाळीच्या तिन्ही मजल्यावर गॅलरीमध्ये बरेचजण उभे होते. सगळ्या तीसच्या तीस खिडक्या भरलेल्या होत्या. एक वेगळेच वातावरण तयार झाले.
सर्वांचा निरोप घेतला आणि निघालो. त्यावेळेस सकाळचे साडे आठ वाजले होते. निघण्यास खूपच उशिर झाला होता. म्हणजे सुरुवातच लडखडत झाली होती. मुंबई तशी माझ्या पायाखालचीच होती, त्यामुळे मुंबईतून बाहेर पडेपर्यंत काहीच अडचण नव्हती. आम्ही सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या चाळीत राहायचो. तिथून सुरुवात केल्यावर सर जे. जे. हॉस्पिटल (Sir J. J. Hospital) मार्गे डॉ. मोहम्मद अली रोडने (Dr. Mohammed Ali Road) भायखळाच्या दिशेने निघालो. आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तिथून पुढे सरळ राणीबाग, चिंचपोकळी, भारतमाता, परळ, दादर, सायन, चेंबूर ते मानखुर्द हा सरळ रस्ता तसा माहीत होता. तिथून पुढे खाडी पूलमार्गे वाशी आणि त्यापुढील भाग हा मात्र नवीन होता. आम्ही आपले इकडे तिकडे पाहात रमतगमत चालत मार्गक्रमण करत होतो. मुंबईतील एकेक विभाग मागे पडत होता. चेंबूरच्या पुढे जरी रस्ता माहीत नसला तरी देखील येजा करणाऱ्या गाड्यांकडे पाहून पुण्याला जाणारा रस्ता हाच आहे हे न विचारता हि कळत होते. आणि एकदाचा आला तो वाशीला जाणारा खाडीपूल. तेथील मोठा टोल नाका. तेथील गाडयांची गर्दी, हे चित्र तसे आम्हाला नवीनच होते. ते सर्व पाहून खाडीपूलावर आलो. एवढा मोठा पूल देखील प्रथमच पहात होतो. पुलावर मध्यभागी आल्यावर जरा कठड्याजवळ थांबलो. आणि सगळीकडे पाहू लागलो. पुलाच्या खाली खोलवर खाडीचे पाणी लाटांबरोबर हलत होते, एकटक त्याकडे पाहिल्यावर पूल हलल्याचा भास व्ह्यायचा. पाण्यावर सूर्याची किरणे पडून सगळीकडे सोनेरी रंगाच्या लाटा वरखाली होताना पहायला मजा आली. पाण्यावर सूर्याची किरणे कुठून पडतात हे पाहण्यासाठी मान वर करून समोर पाहिले तो, पश्चिमेला सूर्याचा लालसर नारंगी गोळा अस्ताला जात असल्याचे जाणवले, आणि मग मात्र मी दचकलो.
प्रमोदकडे पहात मी ओरडलो, “प्रमोद, अरे हे काय?”. त्याला काहीच जाणवले नाही. तो म्हणाला, “कुठंय काय?”
“अरे, तिकडे सूर्य बघ, डुबायची वेळ झाली” मी म्हणालो.
“मग?”, तो म्हणाला.
“अरे, याचा अर्थ आता थोड्याच वेळात सूर्यास्त होवून अंधार पडणार. आणि आपण अजूनही मुंबईतच आहोत. आपल ठरलं होत ना, पहिल्या दिवशी त्या डोंगराच्या पलीकडे पनवेल पर्यंत चालायचे ते. अरे, लोकांना हे कळले तर काय वाटेल त्यांना, जरा आता पाय उचलूया आणि रात्री मुक्कामाला पनवेला पोहोचायचंच”.
चालण्यात असा उशीर झाला. दिवस संपायला आला तरी आम्ही अजून मुंबईतच, ह्या भावनेने मला माझीच लाज वाटू लागली. (म्हणजे आम्ही आतापर्यंत केवळ २0 कि. मी. अंतर पार केले होते.) अशी चूक आपल्याकडून झाली याचे वाईट वाटू लागले. पण आता हाती असलेला वेळ न दवडता रात्री उशीरापर्यंत पनवेलला पोहोचायचेच ह्या निश्चयाने आम्ही पुढे निघालो. खाडीपूल पार करून वाशी गावात आलो. पुढे गेल्यावर रस्ता उजवीकडे वळतो. तिचे जाईपर्यंत ठार अंधार झाला होता. त्याकाळी तिथे एक छोटे मंदिर होते. ( सध्या तिथे रेल्वे लाईन आहे). मंदिरात चौकशी केली पनवेल किती लांब आहे. तिथला पुजारी म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे. तुम्हाला कुठे जायचे?”. आम्ही पुण्याला निघालो हे त्याला सांगितले. त्यावर तो म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे, तुम्हाला आज नाही पोहोचता येणार. शिवाय अंधार झाला आहे, रात्री गाड्या वेगात धावतात. तुम्ही आजची रात्र येथेच राहा”.
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग १
पहिला मुक्काम
पण मी हट्टाला पेटलो होतो, म्हणालो, “नको. आम्ही निघतो. आज रात्री डोंगराच्या पलीकडे तर जाऊच आम्ही”. असे म्हणून आम्ही तिथे न थांबता निघालो. सावधगिरी म्हणून आम्ही गाड्यांच्या विरुध्द्व दिशेने, म्हणजे मुंबईला येणाऱ्या रस्स्त्याने पुण्याच्या दिशेला चालू लागलो. त्याकाळी तिथे नवीन उपनगरे निर्माण झाली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील गाड्यांशिवाय कोणी नव्हतं. चालण्याचा वेग वाढवला, त्यामुळे रात्रीची थंड हवा असून सुद्धा घाम आला. अशा तऱ्हेने चालत चालत बरेच अंतर कापले. पुढे एकदाच तो डोंगर संपला. एक चढ आणि मोठे वळण आले. वळणावरून पुढे आलो तर, खाली मोठे गाव लागले. लांबून दिव्यांचा झगमगाट आणि मोठमोठ्या इमारती पाहून जीवात जीव आला. मनात म्हटलं, “चला, आले एकदाचे पनवेल”.
उतारावरून खाली आल्यावर जरा शंका यायला लागली. मी पाहिलेले पनवेल हे नाही असे वाटू लागले. मग हे कुठले गाव आले मध्येच? तोवर खूप रात्र झाली होती. रात्रीचे ११ वाजले होते. गावात एसटी स्टॅन्ड वगैरे असणारच. तिथे जाऊन पाहूया असे म्हणून डावीकडच्या रस्त्याने आत गेलो. जरा पुढे गेल्यावर लगेचच बसस्टॅण्ड दिसला. ठाणे, वाशी पासून येणाऱ्या स्थानिक बसगाड्या तेथून येजा करता होत्या.
स्टॅण्डवर जाऊन विचारले. “ह्या गावाचं नाव काय आहे?”.
स्टॅन्डवरील माणूस, “कोकण भवन”.
“हे कुठले गाव, नाव कधीच ऐकले नाही”, पनवेल कुठंय मग?” मी म्हणालो.
“हे कोकण भवन आहे, म्हणजे सीबीडी बेलापूर. कोकण रेल्वेचे ऑफिस आहे, कोकण भवन बिल्डींग मध्ये. म्हणून कोकण भवन म्हणतात”. “तुम्ही कोण, कुठे निघालात?”.
मी म्हटले, “आम्ही पुण्याला चालत निघालोय, आणि पनवेल पर्यंत जायचं आहे आज”. आमची माहिती दिली. सोबतची पत्रे दाखविली. तोपर्यंत अजून तीन चार ड्राइवर, कंडक्टर वगैरे तिथे जमा झाले. आमची चौकशी केली.
मग त्यांनी सांगितले. “पनवेल इथून १२ किलोमीटर वर आहे, खूप रात्र झाली आहे. आता आजची रात्र इथेच काढा. आम्ही पहाटे पर्यंत आहोत तुम्हाला सोबती.”
असे म्हणून त्यांच्या विश्रांतीच्या खोलीबाहेर आम्हाला झोपायला सांगितले. चौदा तासांहून अधिक वेळात आम्ही सुमारे ४० किमी अंतर पार केले होते. त्यामुळे पायांचे पार तुकडे पडायची वेळ झाली होती. भूक पण लागली होती. त्यामुळे थोडे फार खाऊन घेतले आणि सकाळी लवकर उठून पनवेल सकाळी सकाळी गाठूया असा विचार केला आणि पायाचे दुखण वगैरे विसरून लगेच झोपी गेलो.
सकाळी लवकर उठलो, रस्त्यात एखादी नदी लागली तर अंघोळ करू असा विचार करून स्टॅण्डवर तोंड वगैरे धुवून चहा घेतला आणि लगेचच निघालो. माझ्या जवळच्या नोंद वहीमध्ये स्टॅण्डवरील अधिकाऱ्याकडून वेळ नोंदवून शेरा लिहून घेतला. कालच्या अनुभवातून शहाणे होऊन अजिबात वेळ न दवडता, इकडे तिकडे न पहाता आम्ही पनवेलच्या दिशेने मार्गक्रमण केले. साधारण दहा-साडे दहा वाजेपर्यंत पनवेल गाठले. तिथे थोडेफार खाऊन घेतले.
दुसरा मुक्काम
मजल दरमजल करीत चाललो असताना पनवेलच्या पुढे १८ किलोमीटर अंतरावर चौक नावाचे गाव लागले. गाव जरा मोठे वाटले. गावाच्या बाहेरून बायपास जात होता. उजवीकडे छोटा रस्ता गावात शिरला होता. संध्याकाळ झालीच होती. तेव्हा यापुढे न जाता याच गावात मुक्काम करूया असे ठरवून गावात शिरलो. आता या अनोळखी गावात कशी रात्र काढायची कळेना. पण मनात म्हटले, “बघूया. पहिले गावात तर जाऊ. गावात शाळा किंवा मंदिर असणारच. तिथे जाऊन काढू आजची रात्र. जेवण नाही मिळाले तरी चालेल, बॅगेतले काहीतरी खाऊन झोपू”. गावात आता शिरताच रस्त्याच्या कडेला पाटी दिसली. ‘शिवसेना शाखा चौक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, आपले सहर्ष स्वागत करीत आहे’. शिवसेना शाखा या गावात आहे हे कळल्यावर आनंद झाला. मनात म्हटले, “चला सोय झाली, आता शाखेतच मुक्काम करूया”. गावात शाखा कुठे आहे, हे विचारल्यावर आम्हाला घेवून दोन तीन मुले शाखेपर्यंत आले. शाखेत काही तरुण मुले बसली होती. जय महाराष्ट्र करून आमची माहिती दिली. आमच्या मुंबईच्या शाखेचे पत्र दाखविले. ते वाचून शाखेतील उपस्थित मुले एकदम खुश झाली. मुंबईचे शिवसैनिक मुंबई ते पुणे चालत जात आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला. लगेच आम्हाला चहा पाणी दिला. तोपर्यंत अंधारले होते.
शिवसैनिकांची मदत
मी विचारले, “आजची रात्र आम्ही इथेच शाखेबाहेर झोपलो तर चालेल का?”
एक शिवसैनिक म्हणाला,”असे कसे होईल, आम्ही तुमची सर्व सोय करू, जरा वेळ थांबा, शाखाप्रमुख येतीलच इतक्यातच, त्यांना निरोप पोहोचवलाय तुम्ही आल्याचा”.
माझ्यावर फारच दडपण आले, ‘आम्ही कोण आणि कुठले?, अन स्थानिक शाखाप्रमुख आम्हाला भेटायला येत आहेत म्हणजे काय?’ त्यांना सामोरे कसे जायचे, काही सुचेना.
नंतर अडचण नको म्हणून एकाला हळूच विचारले, “इथले शाखाप्रमुख कोण आहेत, त्यांचे नाव काय”.
दुसरा शिवसैनिक म्हणाला, “त्यांचे नाव ‘देवेंद्र साटम’, ह्याच गावाचे आहेत”.
इतक्यातच शाखाप्रमुख ‘देवेंद्र साटम” तेथे आले. आल्याबरोबर आमचे अभिनंदन केले आणि थोडी विचारपूस केली. आम्ही त्यांना मुंबईच्या शाखाप्रमुखांचे पत्र आणि आमची नोंदवही दाखवली. त्यांनी नोंदवही मध्ये शेरा लिहिला. स्थानिक शिवसैनिकांना काही सूचना दिल्या, आणि काही लागले तर आमच्या शिवसैनिकांना सांगा तुम्हाला पाहिजे ती मदत मिळेल, असे सांगून निघून गेले. हेच देवेंद्र साटम पुढे कर्जत खालापूर मतदार संघातून तीनवेळा आमदार झाले आहेत.
मग एका शिवसैनिकाने (आता त्यांचे नाव आठवत नाही) आम्हाला त्याच्या घरी नेले. तिथे आम्हाला त्याच्या घरच्यांनी छान जेवण दिले. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात अंथरूणे टाकून दिली. (खूप वर्षे झाल्याकारणाने काही संदर्भ विसरलो आहे, त्यातच, जपून ठेवलेली माझी नोंदवही देखील सापडत नाहीय, त्यामुळे माहीती आणि नावांचा थोडा घोटाळा होवू शकतो, त्याबद्दल क्षमस्व).
तसे फारसे अंतर आज चाललो नव्हतो, पण आज पाय खूप दुखत होते. तेव्हा प्रमोदच्या ताईने दिलेल्या औषधाची आठवण झाली, तिने सांगितले होते कि, “पाय दुखले, तर हे औषध लावा”. औषधाची बाटली काढली, थोडे हातावर घेवून बघितले, आयोडेक्सच्या वासाचे ते एक तेल होते. ते तेल दोघांनी पायांना चोळले. त्याचा चांगलाच घमघमाट सुटला होता. आणि काय आश्चर्य? आमचे ठणकणारे पाय आणि पायचे स्नायूंचे दुखणे चमत्कारीकरीत्या पाचच मिनिटात गायब!
अशा तऱ्हेने आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस संपला. आजच्या दिवसात आम्ही ३० किलोमीटर चाललो होतो. म्हणजे आम्ही दोन दिवसात साधारण ७० किलोमीटर अंतर पार केले होते.
असा प्रवास केल्यावर पुण्याला पोहोचणार तरी कधी? बघू उद्या, असा विचार करून आणि दिवसभराच्या थकव्याने आम्ही पुढच्या पाचच मिनिटात झोपी गेलो.
मुंबई-पुणे प्रवास – भाग २ समाप्त.
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग ३
प्रवासाचा तिसरा दिवस
दिनांक: १८ मे १९८१
सकाळी लवकर उठून आम्ही चौक गाव सोडले. रात्री ज्या शिवसैनिकाच्या घरी आम्ही राहिलो होतो. त्यांच्या छोट्या घरात आमची चांगली सोय केली होती. नवीन गोधड्या, चादरी टाकून आमची झोपण्याची व्यवस्था अंगणात केली होती. सकाळी आम्हाला लवकर उठवले. अंघोळीला गरम पाणी दिले. चहा आणि फराळ करून आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. निघताना त्या शिवसैनिकाने माझ्या हातात एक चिठ्ठी आणि एक पत्ता दिला व म्हणाला, “तुम्ही साधारण संध्याकाळ पर्यंत लोणावळ्याला पोचाल. तेथून जवळच ह्याच रस्त्यावर वलवण गाव आहे, तिथे आमचा एक नातेवाईक आणि शिवसैनिक राहतो, त्याच्याकडे रात्री थांबा. हि चिठ्ठी त्याला दाखवा, म्हणजे तुम्हाला ते मदत करतील”. रस्त्याने जाताना उगीचच कोठे थांबू नका अन सावधगिरी बाळगा अशी आम्हाला सूचना दिली. आम्ही हो हो म्हणालो खरे, पण त्याचा अर्थ आम्हाला पुढे रस्त्यात कळला. त्याचे आभार मानून आणि ‘जय महाराष्ट्र’ करून आम्ही पुढे निघालो.
जंगलांचे रहस्य
चौक गावातून बाहेर पडल्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागलो. त्याकाळी तेथे उजव्या हाताला एक मोठे रिसॉर्ट/हॉटेल होते. काही वर्षांनी त्या हॉटेलमध्ये एक मोठा डायनॉसॉरचा पुतळा उभा केला होता. तिथूनच डाव्या बाजूला चौक ते कर्जत जाणारा फाटा होता. तिथून तासभर चाललो असेल, तर काही अंतरावर जंगल लागले. डाव्या बाजूला भैरीगडाच्या डोंगराचा उतार, मध्ये रस्ता आणि उजव्या बाजूला दूरवर काहीच वस्ती दिसेना. आजूबाजूला झाडी होती. अशा ठिकाणी आम्हाला पाहून बरेच म्हणजे तिने ते चार ट्र्क थांबले, कुठे चाललात म्हणून विचारले. “आमच्या बरोबर चला, आम्ही ट्रकने सोडतो तुम्हाला पुण्याला. पैसे नाही दिले तरी चालेल पण ह्या रस्त्यावरून एकटे जाऊ नका”, असे सांगितले. पण आम्ही त्यांना नकार दिला. मग, काही लागले तर मागून येणाऱ्या ट्रकला हात दाखवा ते मदत करतील असे सांगितले.
आता मात्र ह्या रस्त्याचे रहस्य गडद होऊ लागले. हे सर्व असे का सांगतायत? अन सकाळी चौक गावातील शिवसैनिकाने देखील आम्हाला सावधगिरीची सूचना दिली होती, त्याचा ह्या रहस्याशी काही संबंध आहे का? असे ना ना प्रश्न मनात निर्माण झाले.
पण मनातली शंका झटकून आम्ही निर्धास्तपणे चालू लागलो. उजव्या बाजूला एक छोटे मंदिर दिसले. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथील बाबाने आमची चौकशी केली.
अन, “कशाला या जंगलातून जाताय, एखाद्या ट्रकने जा वर घाटावर. पुढचा रस्ता चांगला नाही. या जंगलात चोर, दरोडेखोर आहेत. ते गाड्या लुटतात. मारहाण पण करतात”. असे म्हटल्यावर ह्या रस्त्याचे रहस्य उलगडले.
पण मी काही मागे हटलो नाही, म्हटले, “बाबा, आले चोर तर येवू द्या, तसेही आमच्याकडे लुटण्यासारखे काहीच नाहीय. भेटलेच तर आमची बॅग उघडून दाखवू, अन, त्यांना आवडला तर बॅगेतील खाऊ देऊ”.
मनात म्हटले, “प्रत्यक्षात समोर चोर-दरोडेखोर उभे राहिल्यावर कसे काय होईल ते माहीत नाही, पण चोर-दरोडेखोर जवळून पाहण्याचा एक अनुभव मात्र घेता येईल”.
आता सर्व रहस्य कळाल्यावर मात्र भीती पळाली. पुढे जाण्याचा आमचा निर्धार पक्का झाला. ‘बघा, जपून जा, अन तसे काही वाटलेच, तर परत या इकडे, मी इथेच असतो”, असे बाबांनी सांगितले. आम्ही निघालो, मंदिरापासून काही पावले पुढे गेलो. तिथे रस्त्याच्या उजव्याबाजूच्या झाडांमागून एक उंच पांढरा बैल अचानक रस्त्यावर आला अन स्वतःच्या तंद्रीत रस्त्याच्या मध्यभागी हलेडुले करत पनवेलच्या दिशेने चालू लागला. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका गाडीचालकाला त्याचा अंदाज काही आला नाही. त्याच्या कारने त्या बैलाला मागच्या बाजूला जोरदार धडक दिली, ब्रेकचा पण मोठा आवाज झाला. बैल रस्त्यावर खाली पडला. गाडीचालक काही थांबला नाही, कारण आम्ही दोघं आणि मंदिराचे बाबा असे तिघेजण साक्षीदार म्हणून उपस्थित होतो, ते पाहून तो पळाला असावा. हे सर्व आमच्यापासून काही फुटांवर नजरेच्या पुढ्यातच घडले, मनात आले कि, आता ह्या बैलाचे मरण आपल्या डोळ्यांनी पाहावे लागेल. नको तो प्रसंग समोर घडला आहे. टाळता म्हणावे तर ते हि शक्य नाही.
पण गंमतच झाली, त्या बैलाला कारची ठोकर बसल्यावर तो खाली कोसळला, परंतू खाली पडताना बैलाचे पुढचे दोन्ही गुढगे दुमडले गेले, अन तसाच तो खाली बसला गेला. त्याच बसलेल्या अवस्थेत तो चक्क १८० अशांच्या कोनात उलटा फिरला गेला. त्याचे तोंड एकदमच विरुद्ध बाजूला म्हणजे खोपोलीच्या दिशेला झाले. क्षणभर तो बैल तसाच खाली बसून राहिला. झालेल्या धक्क्यातून तो बैल सावरला, पुढच्याच क्षणी उठून उभा राहिला. आणि अगदी काहीच घडले नाही अशा तऱ्हेने रस्त्याच्या कडेने खोपोलीच्या दिशेनं चालू लागला, अन डाव्या बाजूच्या झाडीत निघून गेला. जनावरे मुकी असतात, आपल्या भावना ते सांगू शकत नाही म्हणजे नक्की कसे ते अनुभवायास मिळाले. त्या बैलाने साधा हंबरडा पण फोडला नाही, की डरकाळी मारली नाही. खूप वाईट वाटले. रात्री गोठ्यात परत गेल्यावर त्याच्या मालकाला कसे सांगणार, कि माझा आज अपघात झाला आहे, मला खूप दुखत आहे ते. त्या मंदिरातल्या बाबाच्या ओळखीचे कोणी निघाले तरच ते शक्य होते. अन्यथा त्या बैलाला मुकाट्याने वेदना सहन करणे भाग होते.
पुढे जात चाललो, तसतशी झाडी जरा दाट झाली, एका टप्प्याला सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी आणि उंच झाडे असा देखावा पाहावयास मिळाला. तेवढा पट्टा थोडा सावधगिरीने पार केला. पुढे काही वर्षांनी याचे रहस्य पूर्ण कळाले. त्याकाळी त्या भागात रामा, शिवा, गोविंदा (अशीच काही नावे असावीत) ह्या दोन किंवा तीन दरोडेखोरांची टोळी त्या भागात लुटालूट करत अन शेजारच्या जंगलात पळून जात. परिस्थितीने गुन्हेगारी मार्ग पत्करलेल्या ह्यांच्या टोळीला स्थानिक जनतेची सहानुभूती होती. दहा ते पंधरा वर्षे (नक्की आठवत नाही) पोलिसांना त्यांनी हुलकावणी दिलेली होती. त्यांच्या ह्या जीवनपटावर दूरदर्शनवर एक मराठी मालिका देखील प्रदर्शित झाली होती. त्यांना पकडल्यावर पोलिसांनी फार मोठा गाजावाजा केला होता. अशा कठीण रस्त्याने प्रवास केल्यामुळे आमचा आत्मविश्वास मात्र चांगलाच वाढला.
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग १
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग २
घाटातून प्रवास
मजल दरमजल करीत खोपोलीला पोहोचलो. म्हणजे आतापर्यंत १८ कि.मी. प्रवास झाला होता. भूक लागली होती. खोपोली बसस्टँडवर गेलो. गावाहून मुंबईला परत येताना दुपारी अडीचच्या सुमारास आमची एसटी खोपोली बसस्टँडवर थांबत असे, तेव्हा तिथे उसाचा रस वगैरे घेत असू, अन वाटलेच तर समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी पित असू. तेव्हा त्या हॉटेलात काहीतरी खायची इच्छा व्हायची, पण बस जास्तवेळ थांबत नसल्याकारणाने त्या हॉटेलमध्ये खाण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. बसस्टँड पाहिल्यावर ती आठवण जागी झाली, मग ठरवले, आज ह्या हॉटेलमध्ये मनोसोक्त खायचे. तिथे पोटाची भूक भागविली. अन निघालो खंडाळ्याच्या घाटाकडे.
घाटरस्ता सुरु झाला. थंड हवेची झुळूक लागल्यावर सर्व थकवा दूर झाला. नेहमी एसटी बसने खंडाळ्याच्या घाटाचा प्रवास व्ह्यायचा, तो आज प्रत्यक्ष पायी चालून जायचा आहे, ह्या कल्पनेने हुरूप आला. घाटाच्या सुरुवातीला असलेल्या शिंग्रोबाचे आत जाऊन दर्शन घेतले, अन मोठ्या आंनदाने घाट चढून वर आलो. सर्व दऱ्यांमधून खाली डोकावून सर्व निर्सग डोळ्यात साठवून ठेवला. सर्व चढ आणि वळणं कशी आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवले. घाटावरून दिवसाची खोपोली आणि दूरवरचा परिसर कसा दिसतो ते पाहिले. लांबपर्यंतचे उंच उंच डोंगराचे सुळके आणि गडकिल्ले दिसत होते. (त्याकाळी डोंगर आणि गडकिल्ल्यांची नावे फारशी ठावूक नव्हती). पुढे सपाटीला आल्यावर अमृतांजन पुलाच्याखालून जाताना उंच पुलाची भव्यता अनुभवली. पुलाखालून पुढे आल्यावर उजव्या बाजूला दिसणारा नागफणीचा कडा आणि त्याखालील दरी ‘ह्याची डोळा’ पाहिली. जरा पुढे समोरच्या बाजूला एक रेल्वेलाईन बोगद्यातून आत गेली होती, आणि दुसरी लाईन डोंगराला वळसा घालून दुसऱ्या बोगद्यातून आली होती. रेल्वेलाईच्या वरच्या बाजूवरून आलेली टाटा वीज कंपनीची पाईपलाईन रेल्वे लाईनच्या खालून दरीमध्ये लुप्त झाली होती.
बोगद्यातून प्रवास
पुढे रेल्वेलाईनच्या बोगद्यावर आल्यावर दोन फाटे निघाले होते. डावीकडचा रस्ता खंडाळ्याहून उतरणाऱ्या वाहनांकरीता मोठया उताराचा होता आणि उजवीकडचा रस्ता बोगद्याचा होता. मी एसटीने प्रवास केला असल्याने हे दोन्ही मार्ग मला ठाऊक होते. एरवी त्या बोगद्याने नेहमीच रात्री प्रवास केल्यामुळे दिवसाउजेडी हा मार्ग अनुभवूया, असा विचार करून थोडे धाडस करावे म्हणून बोगद्याच्या मार्ग मी निवडला. बोगद्यात अंधार असतो. म्हणून बॅगेतील टॉर्च काढून हातात घेतली. अन शिरलो बोगद्यात. बोगद्याच्या तोंडाशी आणि काही मीटरपर्यंत बाहेरचा उजेड आता आलेला होता. तोपर्यंत काहीच जाणवले नाही. पण जसजसे बोगद्यात आता गेलो, तसतसे मग ‘अंधार माझा सोबती’ म्हणजे काय हे अनुभवयाला मिळाले. गाडयांची वर्दळ तशी कमीच होती. पण सर्व गाड्या आमच्या मागून वेगात येत होत्या, त्यामुळे अजून त्रास वाढला. शेवटी टॉर्च मागच्या बाजूला धरला आणि गाडीची चाहूल लागली कि मागे बघत टॉर्च हलवून दाखवीत राहिलो. एखादी गाडी जवळून गेली कि तिचा वाजणारा कर्कश्य आवाज बोगद्यात घुमायचा. अंगावर एक गरम हवेचा झोत यायचा. बोगद्यात थोडी हवा कमी होती, बोगद्यात छान थंड वाटत होते. बोगदा सुमारे साडेतीनशे फुट लांब होता. भिंतीच्या कडेकडेने चालत कसेबसे बोगद्यातून एकदाचे बाहेर पडलो, अन जीवात जीव आला. पण बोगद्यातून बाहेर पडल्यावर डावीकडची दरी, दरी पलीकडील लांबवर दिसणारे डोंगरमाथे, समोर दिसणारा उल्हास नदीच्या उगमाचा मार्ग हे सर्व पाहिल्यावर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ हे वाक्य आठवले. बोगद्याच्या जरा पुढे दरीच्या तोंडावर एक छोटे विना छप्पर घर किंवा कठडा होता. तेथे सुरक्षितपणे उभे राहून सर्व निसर्गसौदंर्य डोळ्याच्या कॅमेऱ्याने मनात साठवून घेतले अन पुढे निघालो.
खंडाळ्याहून लोणावळ्याला आलो, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. लोणावळ्याची चिक्की सुप्रसिद्ध असते म्हणून चिक्की घेण्यासाठी रस्त्यावरच्या एका छोट्या दुकानात गेलो. दुकानदार जैन होता. त्याचे दुकान खूपच छोटे होते. त्याच्याकडून दोन चिक्कीची अन गोळ्यांची पाकिटे घेतली. आम्ही ज्या ज्या ठिकाणी थांबायचो किंवा खरेदी करायचो, किंवा जेवण, नाश्ता करायचो तेथून दुकान मालक अथवा घरच्या व्यक्ती यांच्याकडून आमच्या नोंदवही मध्ये वेळ आणि शेरा लिहून घेत असू. आमचा उपक्रम पाहून सर्वच आमचे कौतुक करीत, अन दुकानदार किंवा हॉटेल असेल तर आमच्याकडून पैसे घेत नसत. तसेच ह्या छोट्या दुकानदाराने पण केले. आम्ही त्याला पैसे अगोदरच दिले होते, पण आमची नोंद वही पाहून तो खुश झाला. आम्ही घेतलेल्या वस्तूंचे पैसे परत करू लागला. आम्ही त्याला नकार दिला. शेवटी हो ना केल्यावर त्याने आम्हाला अजून खाऊच्या पुड्या भेट म्हणून दिल्या. ह्या छोट्या दुकानदाराची नेहमी आठवण येते, कारण स्वतःचे छोटे दुकान असले तरी त्याचे मन खूप मोठे होते, हे मी स्वतः अनुभवले आहे. त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव आजही आठवतात. त्याचा आदर्श मी घेतला आहे. प्रवास हा माणसाला बरेच काही शिकवून जातो, हे खरेच.
मुक्कामाला पोचलो
लोणावळ्यात चौकशी केली असता वलवण गाव खूपच जवळ आहे असे कळाले. सूर्यास्त झालाच होता, आता अंधार पडायला लागला होता. वलवण गावात गेलो आम्हाला दिलेल्या पत्त्यावर चोकशी करत करत पोहोचलो. ते घर गावात प्रवेश केल्यावर जवळच होते. आजूबाजूंच्या घरापासून थोडे दूर एका शेतात ते घर होते. आमचं जवळची चिठ्ठी अन अन्य पत्र दाखवून आमची ओळख पटवून दिली. तिथे आमचे स्वागत खूपच प्रेमाने झाले. स्वतःच्या घराची मुले सुट्टीवर आली आहेत, असा तऱ्हेने आम्हाला वागवले.
“एका दिवसात एवढे अंतर चालून तुमचे पाय दुखले असतील”, असे म्हणून त्या घरच्या माऊलीने आमच्याकरीता पाणी गरम केले. तसे आमचे पाय खरोखरच ठणकत होते. त्या माऊलीने एका भांड्यात ते पाणी ओतले आणि त्यात पसाभर मीठ टाकले. अन आम्हाला त्या पाण्यात पाय बुडवून जरा वेळ बसायला सांगितले.
दहा मिनिटानंतर आम्ही पाय बाहेर काढले, पुसले, अन काय आश्चर्य? पायाच्या सर्व वेदना १०० टक्के नाहीश्या झालेल्या होत्या. एकदम हलके हलके वाटू लागले. मनातल्या मनात तिचे आभार मानले. तोंडाने आभार व्यक्त करणे म्हणजे तिचा आणि तिच्या भावनेचा अवमान केल्यासारखे झाले असते.
चहा वगैरे झाल्यावर आमची सर्व माहिती आम्ही त्यांना सांगितली. आम्ही एका दिवसात एवढे अंतर चाललो याचे त्यांना कौतुक वाटले. आमच्यासाठी चांगले जेवण केले, अंगणात अंथरून टाकून दिले.
आम्हाला सकाळी लवकर उठवा, असे सांगितले. आणि दिवसभराच्या थकव्याने आम्ही लगेचच झोपी गेलो.
आजच्या तिसऱ्या दिवसात आम्ही चौक ते वलवण दरम्यान एकूण ३२ किलोमीटर अंतर पार केले होते, म्हणजेच तीन दिवसात एकूण १०० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते.
मुंबई-पुणे प्रवास – भाग ३ समाप्त.
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग ४
प्रवासाचा चौथा दिवस
दिनांक: १९ मे १९८१
सकाळी लवकर उठून आम्ही वलवण गाव सोडले. रात्री ज्यांच्या घरी राहिलो होतो, त्या माऊलीने सकाळी आम्हाला लवकर उठवले. आमच्यासाठी अंघोळीला गरम पाणी दिले. मे महिना असूनसुद्धा बाहेर थंडी होती, घर शेतात असल्याने थंडी जास्त जाणवत होती. त्यातच अंघोळीची सोय घराच्या बाहेर एका कोपऱ्यात केली होती. बाहेरच्या थंडीमध्ये गरम पाण्याच्या अंघोळीने फारसा फरक जाणवला नाही. कशीबशी घाईघाईत अंघोळ आटोपली. त्या आजीने चहा फराळ करून दिला. त्यांचे आभार मानून निघालो. परतफेड म्हणून निघताना त्या माऊलीच्या पाया पडलो.
मजल दरमजल करीत मळवली, कामशेत अशी गावे करून चाललो होतो. इंद्रायची नदीचे कोरडे पात्र आणि रेल्वेलाईन ओलांडल्यावर कामशेतच्या पुढे वडगाव मावळ गाव लागते. ह्या रस्त्याच्या समांतर डाव्या बाजूने काही अंतरावरून मुंबई पुणे रेल्वेलाईन जाते. आम्हाला अधेमध्ये लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या ये जा करताना दिसायच्या, ते बघायला मजा यायची. त्या दरम्यान वडगाव मावळच्या अलीकडे दुपारच्या वेळेत पोहोचलो होतो. भूक लागली होती. रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर दोनचार मोठ्या झाडांची सावली छान पडली होती. सावलीत बसून जेवूया असे ठरले. आमच्याकडचे पाणी संपले होते. आजूबाजूला पाहिले तर लांबलचक वावराच्या दुसऱ्या बाजूला घर दिसले. तिकडे जाऊन बाटलीत पाणी भरून आणले. झाडाच्या सावलीखाली निवांत जेवत बसलो. थोड्या वेळात जेवण आटोपलेच होते, आवराआवर चालू होती. तेव्हढ्यात आम्हाला पाहून एक कार रस्त्याच्या कडेला थांबली. त्यातून एक गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबीय खाली उतरले. दोन लहान मुले होती. कार असली तरी ते कुटुंब ग्रामीण भागातील वाटत होते.
त्या गृहस्थाने आम्हाला विचारले, “इथं पाणी कुठे मिळेल?”.
मी त्या शेतातील घराकडे हात करून म्हटले, “आम्ही त्या घरातून पाणी घेतले”.
त्या गृहस्थाने मला म्हटले, “आम्हाला पाणी आणून दे जरा”, असे म्हणून त्यांच्याकडील दोन बाटल्या माझ्याकडे दिल्या.
मला थोडे विचित्र वाटले. मनात म्हटले, ” हा स्वतः जावून का नाही पाणी आणत?”. पण काही न बोलता वावरातील मोठमोठी ढेकळं तुडवीत पुन्हा त्या घराकडे जाऊन दोन बाटल्या पाणी आणून त्यांना दिले. तोपर्यंत त्यांनी झाडाखाली छान बैठक मारून पंगत सुरु केली होती.
मी त्यांना पाणी दिले, अन आम्ही निघालो पुढच्या मार्गाला. त्या गृहस्थाने किंवा त्यांच्या कुटुंबाने आमची अजिबात विचारपूस केली नाही, जेवणार का असे तर विचारलेच नाही, आणि आमचे आभारही मानले नाही, याचे मला वाईट वाटले, असो.
चौथ्या दिवसाचा मुक्काम
संध्याकाळ झाली. अंधार पडला तेव्हा आम्ही देहू रोड गावात प्रवेश केला. गाव हमरस्त्यावर होते आणि चांगलेच मोठे वाटत होते. तेव्हा आजची रात्र इथेच मुक्काम करूया असे ठरवले. पण रस्त्यावर तर सर्वत्र दुकाने दिसत होती. मुक्काम कुठे करायचा हेच कळेना. देहू रोड बाजराच्या गल्लीच्या जरा पुढे आलो तर एका दुकान बंद दिसले, अन दुकानाचं बाहेर चांगली ऐसपैस जागा दिसली. मुख्य म्हणजे शेजारच्याच दुकानात एक भटारखाना (खानावळ) होता. तिथे मोठया शेगडीवर भले मोठे पातेले होते, त्यात डाळीच्या वरणाचा एक प्रकार रटरट शिजत होता. जोडून असलेल्या दुसऱ्या शेगडीवर एकजण रोट्या बनवत होता. त्याच्या बाजूला रोट्यांची चळत तयार झाली होती. शेजारीच एका मोठ्या पातेल्यात भात शिजवून ठेवला होता. हे सारं पाहिल्यावर भूक उफाळून आली, पण आता जरा जेवण केले, तर रात्री परत भूक लागेल, तेव्हा काहीच खायला मिळणार नाही, सारी दुकाने बंद झालेली असतील. उशिरात उशिरा ह्याच भटारखाण्यातून जेवण घेवू, आणि आता थोडी बिस्किटे वगैरे खाऊ असा विचार केला. आम्ही त्या बंद दुकानाच्या बाहेरच आमच्या बॅगा ठेवल्या, पायातील बूट काढले अन जरा मोकळे झालो.
आमच्या प्रवासात जिथे जिथे शक्य होईल तेव्हा, किंवा टपालाची लाल पेटी दिसली कि मी लगेचच बॅगेतून एक पोस्टकार्ड काढून, आम्ही कुठे आहोत, कसे आहोत ह्याची खुशालीचे पत्र लिहून टाकत असे. त्याकाळी आदल्या दिवशी टाकलेलं पत्र पुणे ते मुंबई प्रवास करून चक्क एका दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारच्या डाकेने घरी पोचत असे. (नवीन पिढीने ह्यावर विश्वास ठेवावा, हवे तर जुन्या लोकांना विचारावे). ह्या मोठ्या बाजारपेठेत जवळपास टपालाची पेटी असणारच ह्या विचाराने लगेच पत्र लिहून काढले. पायात बूट नुसतेच चढवले आणि निघालो पेटी शोधायला. साधारण शंभर मीटर अंतरावर पेटी होती. तिथे जाईपर्यंत पायांनी असहकार पुकारला, पोटरीत गोळे आले, पाऊल पुढे टाकवेना, त्यातच मोजे न घालता तसाच निघाल्याकारणाने पायाचे तळवे दुखायला लागले, जमीन पायाला टोचू लागली. पाऊल पुढे टाकले कि तळव्यातून भयंकर वेदना यायच्या, रस्त्यावरील खडी वगैरे खालून टोचायची. हातात पाय घेवून चालण्याची सोय असती तर बरे झाले असते, असे भयंकर विनोदी विचार त्या अवस्थेत सुचू लागले. कसाबसा टपाल पेटीत पत्र टाकून परत आलो. जागेवर आल्यावर पहिले पायातून बूट काढले, आणि एकेक पाय हातात घेवून बसलो. पायाला भयंकर वेदना होत होत्या. पायाच्या तळव्यांना असंख्य भोके पडली आहेत आणि त्यातून पायाला असंख्य सुया टोचत आहेत असे वाटत होते. पुन्हा एकदा प्रमोदच्या बहिणीने दिलेले तेल घेवून गुढग्यापासून खाली दोन्ही पायांना ते तेल लावले. तेव्हा पाच दहा मिनिटांनी वेदना बंद झाल्या.
आम्ही थोडी विश्रांती घेतली. आता उद्या आपण पुण्यात पोहोचू अन आपल्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण होईल, ह्या विचाराने आनंद झाला. रात्र वाढू लागली. रस्त्यावरची रहदारी कमी झाली. फक्त मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या येजा करत होत्या. आजूबाजूची काही दुकाने बंद होऊ लागली. लवकरच शेजारचा भटारखाना सुद्धा बंद होईल, त्या अगोदर जेवून घेवूया, अशा विचाराने तेथून जेवायला डाळ (वरण), रोटी आणि भात घेतला. भुकेपोटी त्या डाळभाताची चव अप्रतिम लागली. गेले तीन तास त्या भटारखान्यात लोक आमच्याकडे पहात होतीच. आम्ही पैसे द्यायला गेलो तेव्हा आमची चौकशी केली त्यावर, “चाहो तो और खावो, लेकिन पैसा देनेका नही|” असे म्हणून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाही. रात्री बाहेर झोपण्यास काही अडचण नाही. “इधरही सो जावो”, असे सांगितले. त्या भटारखान्याच्या जागी आज मोठी बेकरी झालेली आहे. रोज नोकरीनिमित्त चिंचवडला जाताना त्याच रस्त्यावरून बसने जाणे होते, त्या प्रत्येकवेळी त्या बेकरीकडे लक्ष जातेच. कित्येक वेळा वाट वाकडी करून त्या बेकरीतून काही खरेदी केलेली आहे.
थोड्याच वेळात तो भटारखाना (खानावळ) बंद झाला. सर्वत्र सामसूम झाली. मग आम्ही देखील शांतपणे आडवे झालो.
अशा तऱ्हेने आजचा आमच्या प्रवासाचा चौथा दिवस संपला. आजच्या चौथ्या दिवशी आम्ही सर्वात जास्त अंतर पार केले होते. वलवण ते देहू रोड हे सुमारे ४२ किलोमीटरचा पल्ला आम्ही १० तासात पूर्ण केला होता. (विश्रांतीची वेळ न धरता).
दिवस पाचवा
आजच्या दिवसात पुण्याला पोहोचायचंच ह्या निश्चयाने आम्ही सकाळी पुढे चालण्यास सुरुवात केली. तसेही पुणे आता केवळ २५ किलोमीटर अंतरावरच होते. त्यामुळे वेगळेची चिंता नव्हती. पण पुण्यात संध्याकाळच्या आत पोहोचलो, तर पुण्याला एक चक्कर टाकून पुणे पहाता देखील येईल, ह्या विचाराने भरभर निघालो. पूर्ण उजाडले होते, पण अजून भटारखाना उघडला नाहीत, कदाचित उशीरा सुरु करीत असतील. आजूबाजूला चहाचे दुकान हि दिसेना. पण रस्त्याच्या पलीकडे एकाने त्याचे उसाच्या रसाचे गुऱ्हाळ सकाळीच चालू केले होते. ते पाहून जरा नवलच वाटले. “पण जाऊदे, आपली तर सोय झाली. आज चहा ऐवजी ऊसाचा ताजा रस पिऊन दिवसाची सुरुवात करूया”, असा विचार करून रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. मोठा काचेचा पेला भरून पाहिल्या धारेच्या ताज्या उसाच्या रसाचे प्राशन केले.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्या रसवाल्या काकांकडून नोंदवही मध्ये दिनांक, वेळ आणि स्थान याची माहिती नोंदवून घेतली. मग त्यांनी अधिक माहिती विचारून घेतली. ह्यात जरा वेळ निघून गेला. असा वेळ वाया जात आहे, असे दिसल्यावर मग मी घाई केली. भराभरा बॅग उचलून त्या काकांचा निरोप घेतला आणि निघालो पुण्याच्या दिशेला. तीन चारशे मीटर अंतरावर पूल लागतो. त्या पुलाखालून रेल्वेलाईन मुंबई पुणे हमरस्त्याच्या डावीकडून उजवीकडे जाते. पुलाचा चढ चढून वर आलो. खालची रेल्वेलाईन दिसू लागली. तो अचानक आठवले.
मी प्रमोदला विचारले, “अरे आपण त्या उसाच्या रसवाल्याला पैसे दिले का?”. तो नाही म्हणाला.
“अरे मग आपले चुकले, त्या काकांना काय वाटेल?, असं तो माणूस यापुढे कोणावर विश्वास नाही ठेवणार. चल आपण परत जावून रसाचे पैसे देऊया”. मी म्हणालो.
पण मनात ना ना विचार येऊ लागले.
“आम्ही प्रामाणिकपणे पैसे द्यायला जायचो, अन जर त्याच्या लक्षात अगोदरच आले असेल, आणि तो आमच्यावर रागावला असेल तर आम्ही आयतेच त्याच्या तावडीत सापडू. मग तो काय करील याचा काय नेम नाही. त्यांच्याकडचे तीर्थ प्राशन तर केलेच होते, जोडीला उगाचाच सकाळी सकाळी प्रसादही मिळायचा.”
“पण आम्ही पैसे द्यायला विसरलो किंवा दिले नाही. हे कदाचित त्याच्या लक्षात देखील आले नसावे. नाहीतर आमच्या मागे धावत येऊन आम्हाला हटकले असते. किंवा जाऊदे पैसे. ती मुलं एवढं करतायत, त्याला आपली एक मदत”, असा विचार करून कदाचित त्याने विचार सोडला असावा. आणि त्याच्यापर्यंत जाउन परत यायचे म्हणजे सुमारे एक किलोमीटरचे अंतर वाढणार होते. ह्या विचाराने मी म्हणालो, “जाऊदे, आपण पुढेच जावूया”, आलाच मागावर तर बघू काय करायचे ते”. असे ठरवून आम्ही पुढे निघालो.
पण त्या रसवाल्या काकांची बोहनी आम्ही फुकट रस पिऊन केली, त्यामुळे त्याचा दिवस कसा गेला असेल, असा विचार अधूनमधून डोक्यात यायचा. आम्ही तब्बल ६० पैसे बुडवले होते त्या रसवाल्या काकांचे, हे आठवले कि हसू येतं.
पुण्यात प्रवेश
पुढे निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी अशी अनेक गावे करत आम्ही दापोडीला पोहोचलो (हि सर्व नावे आम्हाला नंतर माहित झाली). दापोडीला आमचे दूरचे नातेवाईक राहात होते. ते आमचे कोकाटे आजोबा. त्यांच्या घरी पत्र पाठवून आम्ही पुण्याला चालत येत आहोत हे अगोदरच कळविले होते. त्यांच्या मुलाचे ‘रवींद्र जनरल स्टोर्स’ ह्या नावाचे दुकान दापोडीच्या सीएमई गेटच्या समोरच्या चौकात होते. रवींद्र मामा गेले दोन दिवसापासून आमची वाट पहात होते. आणि त्यांनी तसे आजूबाजूच्या दुकानदार मित्रांनाही सांगून ठेवले होते. साधारण एक दीड वाजता दापोडीला त्यांच्या दुकानापाशी गेल्यावर आमची ओळख सांगितली. आम्हाला पाहून रवींद्र मामाला खूपच आनंद झाला. मी पण त्यांना प्रथमच पहात होतो. त्यांनी लगेच आजूबाजूला आम्ही मुंबईहून चालत चालत दापोडीला पोहोचलो हे कळविले. आजूबाजूचे दुकानदार गोळा झाले. शेजारच्या हारवाल्याने आमच्यासाठी दोन छोटे हार आणले. लगेच दापोडी चौकात शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर आमच्या हार घालून सत्कार केला. सर्वांनी टाळ्या वाजवून आमचे अभिनंदन केले. शहिद भगतसिंग यांच्या अर्धपुतळ्या समोरच आमचा सत्कार झाल्याने मी खूपच भारावून गेलेलो होतो. कारण शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा हॅटवाला फोटो नेहमी माझ्या पाकिटात असायचा. मग मला रवींद्र मामाने दोन शब्द बोलण्यास सांगितले. आता आली का पंचाईत? मी तसा मुखदुर्बल होतो. जास्तच आग्रह झाल्यावर, “अजून आमची मुंबई-पुणे पदयात्रा पूर्ण झालेली नाही, तेव्हा आम्हाला आता रजा द्यावी”, असे म्हटल्यावर सर्वजण भानावर आले अन आमची लगेचच सुटका केली.
आणि तिथून पुढे सुरु आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा.
मुंबई-पुणे प्रवास – भाग ४ समाप्त.
प्रवासाचा पाचवा आणि शेवटचा दिवस
दिनांक: २१ मे १९८१
पुण्यात पोहोचलो
पाचव्या दिवशी दुपारी साधारण एक दीड वाजता दापोडी चौकात माझे नातेवाईक स्व. रवींद्र कोकाटे यांच्या दुकानापाशी पोहोचलो होतो. तेथील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर आमचा हार घालून सत्कार केला गेला. तेव्हा मला रवींद्र मामाने दोन शब्द बोलण्यास सांगितले. जास्तच आग्रह झाल्यावर, “अजून आमची मुंबई-पुणे पदयात्रा पूर्ण झालेली नाही, तेव्हा आम्हाला आता रजा द्यावी”, असे म्हटल्यावर आमची लगेचच सुटका केली. आणि आम्ही मार्गस्थ झालो.
आणि तिथून पुढे सुरु झाला आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा.
दापोडी ते पुणे हे केवळ ९ ते १० किलोमीटरचे अंतर पार केले कि पुण्याला पोहोचणार आणि आमचा संकल्प पूर्ण होण्यास आता फक्त तीन ते चार तासाचा अवधी उरला आहे, ह्या विचाराने आमचा हुरूप वाढला आणि आम्ही भराभरा चालू लागलो. शेवटी एकदाचे शिवाजीनगरच्या रेल्वे पुलावर पाऊल टाकले. उजव्या बाजूला खाली शिवाजीनगर रेल्वे स्थानक दिसले आणि आत्तापर्यंत खूपदा नाव ऐकलेले शिवाजीनगर ह्याची डोळा पाहिले आणि धन्य धन्य वाटले.
चक्क छत्रपतींच्या गावात पाऊल टाकल्याचा आनंद झाला. हेच ते पुणे, जिथे छत्रपती शिवाजीराजे लहानपणी बागडले आहेत. हेच ते पुणे, जिथे जीजाऊंनी बाळ शिवबाच्या हाताने सोन्याचा नांगर शेतात फिरवून पीडित जनतेचा स्वाभिमान जागा केला. हेच ते पुणे, जिथे जीजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबाने रांझ्याच्या पाटलाच्या अन्यायपूर्वक वागणुकीला दण्डित करून जनतेला स्वकीयांच्या न्याय्य राज्यकारभाराची ग्वाही दिली. हेच ते पुणे, जिथे लालमहालात राजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हेच ते पुणे, जिथून पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार केला. शाळेत असताना अभ्यासलेली चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पाने भर्रकन नजरे सामोरून गेली. अशा ह्या इतिहासप्रसिद्ध पुण्यनगरी मध्ये पाऊल टाकले ह्या केवळ विचारानेच शरीरातून वीज चमकल्याचा भास झाला. छाती आणि डोळे दोन्ही भरून आले.
पुण्यात नानापेठेत राहणारे आमचे नातेवाईक श्री. खवले यांच्याकडे मुक्कामाला जायचे होते. आता पुणे शहरात मुंबई सारख्या ईमारती आणि दुकाने, गाडयांची गर्दी दिसू लागल्यावर थोडे भांबावलोच होतो. ह्या अनोळखी शहरात फक्त ‘२४४, नाना पेठ, डोके तालीम जवळ’ एवढ्याशा पत्त्यावर कसे पोहोचू याची काळजी वाटू लागली. पण ‘पुणे तिथे काय ऊणे’ ह्या म्हणीचा प्रत्यय मात्र चांगल्या अर्थाने आम्हाला पुण्यात लगेच आला. पुण्यातील गर्दीने आमच्या अवताराकडे पाहून आणि चौकशी करून उत्तम मार्गदर्शन केले. शिवाजीनगरहून मनपामार्गे मुठानदीवरील भव्य दगडी पुलावरून पलीकडे गेलो, तो दर्शन झाले भव्य शनिवारवाड्याचे आणि त्या समोरील मराठेशाहीचे थोर सेनापती थोरले बाजीराव यांच्या पुतळ्याचे. परंतु शनिवारवाड्याच्या आत न जाता वाड्याला डाव्या बाजूने वळसा घालून पुढे आलो. येथून जवळच छत्रपती शिवाजींचे बालपण गेले तो लालमहाल आहे हे एकूण माहीत होते. शनिवारवाडा एवढा मोठा तर छत्रपतींचा लालमहाल केवढा प्रचंड मोठा असेल ह्याची कल्पना करत करत लालमहाल अजून दिसत का नाही, ह्या विचाराने रस्ता ओलांडून सिग्नलला थांबून चौकशी केली. तो एकाने समोरच हात दाखवून म्हटले, “हाच लालमहाल”. त्या दिशेनं पाहिले तो एक लाल विटकरी रंगाची बंगलीवजा ईमारत दिसली आणि फारच भ्रमनिरास झाला. छत्रपती शिवाजीराजांचे बालपण ज्या जागी गेले, ज्या ठिकाणी कित्येक मोहिमा रचल्या गेल्या असतील, कित्येक न्यायनिवाडे तिथे झालेत, तो महाल आजूबाजूच्या ईमारती आणि चाळींच्या गराड्यात अंग चोरून उभा असावा हे माझ्या कल्पनेच्या पलीकडले होते. हे मात्र आमच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले नव्हते. ते पाहून मात्र वाईट वाटले. असो.
पुढे लक्ष्मी रस्त्यावरून डावीकडे वळून सिटी पोस्ट ऑफिस समोरून सरळ चालत एकदाचे नाना पेठेत ईच्छित स्थळी म्हणजे ‘२४४, नाना पेठ, डोके तालीम जवळ’, येथे पोहोचलो. आमचे नातेवाईक म्हणजे माझ्या लांबच्या मावशीच्या घरी पोहोचलो. तिला आम्ही बेबी म्हणायचो. काकांचे नाव सुधाकर खवले. मुंबईहून निघण्यापूर्वी त्यांना पत्र टाकलेच होते, त्याप्रमाणे ते सर्व आमची वाटच पहात होते. मावशीने आमचे स्वागत केले. काही वर्ष अगोदर काका आणि मावशी मुंबईला आमच्या घरी आले होते, त्यामुळे ओळख लगेच पटली. पुण्यातील वाडा संस्कृती तिथे अनुभवली. एकूणच मुंबईतील चाळीसारखेच वातावरण होते. सर्वकाही सार्वजनिक. थोड्याच वेळात काका कामावरून आले. आमचे अभिनंदन केले. आमची नोंदवही पाहिली, अन म्हणाले, “तुम्ही चांगले धाडसी कार्य केले आहे, ह्याची बातमी वर्तमानपत्रात यायला हवी.” मी असा काही विचार केलाच नव्हता. तेवढ्यात काकांनी त्यांचा मुलगा केशवला सांगितले, कि “यांना ‘सकाळ’ मध्ये घेवून जा”. मग आम्ही केशव बरोबर ‘दैनिक सकाळ’ च्या पुणे कार्यालयात गेलो. तेथील स्थायी वार्ताहर काकांनी आमची नोंदवही पाहिली आणि लगेच आमची एक छोटी मुलाखत घेवून टाकली. जरा बरे वाटले, आमचा हा उपक्रम आणि धाडस लक्षणीय ठरले याचा अभिमान वाटला. पुढे त्या मुलाखतीचे काय झाले कळले नाही.
आमचा उपक्रम
तर अशा तऱ्हेने ‘मुंबई ते पुणे’ पायी चालत जाण्याचा आमचा उपक्रम यशस्वी झाला. दि. १७ मे १९८१ रोजी सकाळी ८.३० ला मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनहून चालण्यास सुरुवात केली आणि दि. २१ मे १९८१ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुण्यातील नाना पेठेत सांगता केली. आमच्या नोंदवही मधील नोंदीप्रमाणे आम्हाला मुंबई ते पुणे हे सुमारे १६०-१६५ किलोमीटरचे अंतर जुन्या हमरस्त्याने पायी पार करण्यास आम्हाला एकूण ५० ते ५२ तास लागले. म्हणजेच दररोज सरासरी ३२ किलोमीटरचे अंतर आम्ही रोज चालत होतो. (दुर्देवाने आमची ती नोंदवही आता सापडत नाहीय). चौथ्या दिवशी आम्ही सर्वात जास्त अंतर पार केले होते. वलवण ते देहूरोड हा सुमारे ४२ किलोमीटरचा पल्ला आम्ही चौथ्या दिवशी पार केला होता. आम्ही दिवसा उजेडी सकाळ ते सायंकाळ ह्या वेळेतच प्रवास केला (अपवाद पहिल्या दिवशीचा). आम्हाला काही कुठला जलद चालण्याचा विक्रम वगैरे करायचा नव्हता. फक्त पायी चालण्याचा मनोसोक्त अनुभव घ्यायचा होता. म्हणून आम्ही चालण्याचा वेग आणि वेळ यांचे गणित सोडवले नाही. (तसेही हे वेग आणि वेळ यांचे गणित शाळेत गणिताच्या तासाला पण सुटले नव्हतेच). पण ठरवलेले ध्येय न थकता आणि अर्धवट न सोडता यथाशक्ती पूर्ण केले याचे समाधान आम्हाला मिळाले. आणि त्या जोरावर आता आयुष्यात कधीच अपयशी ठरणार नाही हा आत्मविश्वास बळावला. जो पुढील आयुष्यात कामी आला. कुठलेही आव्हान स्विकारण्याचे धाडस मनात निर्माण झाले.
पुण्याच्या महापौरांची भेट
दुसऱ्या दिवशी काकांनी अजून एक काम मागे लावले. केशव बरोबर आम्हाला पुणे शहराचे तत्कालीन महापौरांच्या कार्यालयात पाठविले. पुण्यातील वास्तव्यात केशव आमचा वाटाड्या आणि मार्गदर्शक बनला होता. केशवने मग आम्हाला ‘कॉर्पोरेशन’ला नेले. म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या मुख्यालयात. एखादया इमारतीचे नाव ‘कॉर्पोरेशन’ कसे असू शकते याचे मला त्यावेळी नवल वाटायचे. केशवने आम्हाला सरळ पुणे शहराचे तत्कालीन महापौर श्री. सुरेशजी तौर यांच्या कार्यालयात नेले. महापौरांनी आमची नोंदवही आणि मुंबईचे माजी महापौर स्व. राजाभाऊ चिंबूलकर यांनी दिलेले शिफारसपत्र पाहिले. आमचे कौतुक केले, चहा पाजला. चहा पिऊन होईपर्यंत त्यांच्या स्वीय सहायकाने महापौरांनी सांगितल्याप्रमाणे पत्र टाईप केले. आणि पुण्याच्या महापौरांनी त्यावर स्वाक्षरी करून आम्हास प्रशस्तिपत्रक दिले. त्यांचे आभार मानून आम्ही तिथून निघालो.
हेच पुणे शहराचे माजी महापौर श्री. सुरेशजी तौर सुमारे २९-३० वर्षांनी शिवाजीनगर कोर्टात एका कोर्टरूमच्या बाहेर स्वतःच्या टाईपरायटरवर पक्षकारांचे अर्ज वगैरे टाईप करताना मला दिसले. समाजासाठी झटणारा एक साधा आणि प्रामाणिक कार्यकर्ता उच्चपदावर जाऊन पुन्हा समाजात कसा साधेपणाने वावरतो ह्याचे ते मुर्तिमंत उदाहरण होते. केवळ एखादी टर्म नगरसेवक झाल्यावर सात पिढ्या बसून खातील एवढी मोठमोठी सामाजिक आणि लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विपरीत उदाहरण डोळ्यासमोर दिसले. मी ऐन सकाळी कामाच्या गर्दीच्या वेळेत तिथे गेल्याकारणाने त्यांना ओळख सांगून त्यांच्या कार्यात व्यत्यय आणला नाही. असो. थोडे विषयांतर झाले.
महापौरांच्या कार्यालयातून निघाल्यावर केशवने आम्हाला पुणे दर्शन घडवले. नक्की काय काय पाहिले ते आता आठवत नाहीय. पण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. पुण्यातील पुलावरून चालत असताना पश्चिमेला सिंहगडाचे दर्शन झाले आणि धन्य धन्य झालो. लांबून पर्वतीही बघितली. लाल महालात जाऊन थोडे ऐतिहासिक काळात फिरुन आलो. वेळ कमी होता. त्यामुळे फार न फिरता मुक्कामी परतलो. संपूर्ण पुणे पाहण्यासाठी लवकरच परत येऊ असे स्वतःला आश्वासन दिले.
आता ‘पुणे ते मुंबई’
आता वेळ आली ती ‘पुणे ते मुंबई’ चालत येण्याची. पण अगोदरच वेळ आणि वेळेचं गणित बिघडलेले होते. तीन दिवसात पुण्याला पोहोचू, दोन दिवस पुण्यात काढू आणि परत ‘पुणे ते मुंबई’ चालत येऊ, हे सर्व करण्यास ७ ते ८ दिवस लागतील अशा विचाराने घराबाहेर पडलो होतो. पण पुण्यास पोहोचण्यास पाच दिवस लागले, आणि आता आणखी पाच दिवस परत जाण्यास लागतील, एवढा त्रास घेण्याचे आणि वेळ घालविण्याचे नकोसे वाटले. आणि मग पुण्यातून तिसऱ्या दिवशी सकाळच्या पुणे मुंबई पॅसेंजर गाडीने आम्ही मुंबईस परतलो. संध्याकाळी घरी पोहोचलो. अख्खी चाळ आम्हाला पहाण्यासाठी माझ्या घरी आली. बऱ्याच जणांनी नाना चौकशा केल्या, आमचे अनुभव विचारले. दोन तीन दिवसांनंतर सगळे सांगतो असे सर्वांना सांगितले. दोन तीन दिवस तर सोडाच, पण आमची ‘ मुंबई-पुणे’ ची कथा लोकांना सांगण्यास तब्बल ४० वर्षांचा अवधी लागला. आमच्या चाळीतले आमचे मित्र आणि नवीन पिढी वगैरे आता मोबाईलवरून आमचे प्रवास वर्णन वाचत आहेत. माझा सहकारी प्रमोद राऊत आता ऍडव्होकेट प्रमोद राऊत झाला आहे.
१९८१ साली आमचे प्रवासातील जेवण-खाणे, रस-सरबत पिणे ह्या शिवाय पुणे ते मुंबई पॅसेंजर रेल्वेचे तिकीट हा सर्व खर्च प्रत्येकी फक्त १८ रुपयेच झाला होता.
त्यांनतर साधारण एक वर्षाने मुद्दाम वेळ काढून पुण्यास गेलो. तेव्हा बऱ्याच जणांनी म्हणजे दापोडी आणि नाना पेठेतील नातेवाईकांनी सांगितले. ‘अरे, तुम्ही मुंबई पुणे पायी चालत आला होता, त्याची बातमी सकाळ मध्ये आली होती.’ मनातल्या मनात स्वतःला दोष दिला, कि आपण इतर सर्वांच्या बातम्या वाचतो, पण स्वतःचीच बातमी वाचायची राहून गेली.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, ‘चला घराबाहेर पडा’. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल.
मुंबई-पुणे प्रवास – शेवटचा भाग ५ समाप्त.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.