http://indiatravel-rohan.blogspot.com/2010/01/blog-post.html
सलग ४ महीने 'लडाख'वरील लिखाण पूर्ण केल्यानंतर महीनाभर ह्या ब्लॉगला थोडा आराम दिला होता. पण माझा आराम सुरू नव्हता. इतर ब्लोग्सवर 'सह्यभ्रमंती' आणि 'इतिहासा'वरील लिखाण सुरू होते. शिवाय 'खादाडी' चालू
होतीच. तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी रिकामेपणा जाणवत होता. आपण सुरू केलेला
कुठला ही ब्लॉग थंड पड़ता कामा नये असे सारखे वाटत होते. शेवटी २००८ साली
नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये केलेल्या भटकंतीवर लिखाण करायचे ठरवून
टाकले. पण बऱ्याच गोष्टी आठवत नव्हत्या तर काही अर्धवट आठवत होत्या. नेमकी
त्या दिवशी रात्री उशिराने ऐश्वर्या 'रेघेवर सदृश्य' झाली.
म्हणजे 'ऑन-लाइन' आली असे म्हणायचे आहे हो... :) मग काय विचारता ...
जवळ-जवळ तासभर तिच्याबरोबर गप्पा टाकल्या आणि आख्खा ट्रेक पुन्हा जागा
केला. तर झाले असे होते .... जून २००८ ची गोष्ट. एके दिवशी आमचा खंदा
प्लानर अभिजित Y.H.A.I. म्हणजे यूथ होस्टेलच्या ट्रेक्सबद्दल माहिती घेउन
आला. "अरे, नोर्थ इस्टचा एक मस्त ट्रेक आहे. जाउया का?" पण माझ्या सुट्टीच्या तारखा आणि ट्रेकच्या तारखा जमत नव्हत्या. पण थंड बसतोय तो अभ्या कसला.. त्याने दुसरी माहिती काढली. "अरे, नोव्हेंबर महिन्यात राजस्थान स्टेटचा पण एक ट्रेक आहे. अरावली - रणकपुर - कुंभळगड़ ट्रेकिंग एक्सपिडिशन २००९. तो करुया. तारखा पण फिट बसत आहेत."
अभि-मनाली आणि मी तयार होतोच. अजून कोण-कोण येणार असे अनेकांना
विचारल्यावर 'मी नक्की येणार' असे ऐश्वर्या एका पायावर उड्या मारत म्हणाली.
ह्या पोरीला फिरायला आणि खादाडी करायला कधीही कुठेही सांगा. अशीच उड्या
मारत तयार. आई शप्पथ.. खरच.. सांगतोय. असे का म्हणतोय ते पुढे-पुढे
येईलच... :) माझ्याबरोबर पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड
मोहीम केलेल्या आणि नुकत्याच लडाखवरुन परतलेल्या अनुजाने सुद्धा यायचे
नक्की केले. याशिवाय अभिचे संजीव उर्फ़ संजू आणि दिपक हे २ मित्र सुद्धा
यायला तयार झाले. संजू हा 'संस्कृत शिक्षक' आहे तर दीपक L.I.C. मध्ये
कामाला आहे. अशी एकुण ७ जणांची टिम तयार झाली. आकडा नकी झाल्यावर अभिजितने
ट्रेन आणि ट्रेक अश्या दोन्ही तारखा नक्की करून टाकल्या. राजस्थान यूनिटचे
'रतनसिंग भाटी' यांना आम्ही नेमके कुठल्या तारखेला येतोय ते कळवले. आणि
सुरू झाली अजून एक भ्रमणगाथा ...
९
नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता बोरीवली स्टेशनवरुन अरवली एक्सप्रेस
पकडायची होती. मी, दिपक, अभिजित आणि मनाली ठाण्याहून संध्याकाळी निघालो.
बाकी सर्व थेट बोरीवलीलाच भेटणार होते. कविता आम्हाला ट्रेनवर भेटायला
येणार होती. गंमत म्हणजे संध्याकाळ ऐवजी ती सकाळीच ९ वाजता आम्हाला भेटायला
बोरीवली स्टेशनला जाउन पोचली. मी सांगताना चुक केली की तिने ऐकताना ते
माहीत नाही पण तिला एक हेलपाटा पडला हे नक्की. मग संध्याकाळी ती परत
स्टेशनला आली. सर्वजण ९ च्या आसपास बोरीवलीला येउन पोचले होते. काही
मिनिट्समध्ये ट्रेन येणार आणि आम्ही आमचा प्रवास सुरू करणार इतक्यात... "मला जाम भूक लागली आहे. ह्या ट्रेनमध्ये रात्री खायला मिळेल का रोहन... आपण काहीतरी खायला घेउन येऊया."
- ऐश्वर्या उवाच. मग अभि आणि संजू दोघेजण पुन्हा स्टेशनच्या बाहेर गेले
आणि समोसा, ढोकळा असे पटकन संपणारे, भूक भागवणारे पदार्थ घेउन आले. ते आले
तरी गाडी काही अजून येत नव्हती. न राहून ते पदार्थ हादडणार तितक्यात गाडी
आली. कविताला टाटा केला आणि आम्ही प्रवासाला सुरवात केली. ट्रेनमध्ये
दिल्लीच्या मनोमयी दीदी सुद्धा होत्या. 'मनोमयी दीदी' म्हणजे अभि, संजू आणि
दिपकच्या YHAI ट्रेक फ्रेंड. त्या महाराष्ट्र यूनिटच्या ट्रेकवरुन
राजस्थान आणि मग तिकडून आपल्या घरी दिल्लीला जाणार होत्या. आता आम्ही ८ जण
असल्याने एक आख्खा बर्थ आमचाच होता. तेंव्हा तंगडया पसरल्या आणि गप्पा टाकत
बसलो. त्या सोबत खादाडी सुरू झालीच होती. चांगले १२-१५ समोसे होते आणि
ढोकळा अर्धा किलो तरी होता वाटते. या शिवाय अनुजाने घरून कोलंबी भात बनवून आणला होता तर दिपकने बोंबिल फ्राय.
आयला आता हे माहीत असते तर समोसा ढोकळा आणला असता का? मग काय ... आम्ही तर
सुटलो होतो. मी आणि ऐश्वर्या, त्यात अनूजा आणि संजू म्हणजे कसली तगडी टिम
होती विचार करा.
खाता-खाता अनुजा लडाख बद्दलच्या गोष्टी सांगत होती तर मध्येच दिपक-अभि-संजूच्या 'हर की दुन'च्या
गोष्टी सुरू व्हायच्या. इतके खाल्ले तरी काही समोसे आणि बोंबिल फ्राय
उरले. ते एका बैग मध्ये ठेवून खिडकीच्या मध्ये ती लटकवली. आजुबाजुला बसलेले
लोक जसे आडवे व्हायला लागले तसे आम्हाला सुद्धा आवाज खाली करावे लागले.
उगाच बाकीच्यांना कशाला त्रास नाही का.. आम्ही सुद्धा आडवे झालो. मी आणि
अभि समोरा-समोर अप्पर बर्थ वरती झोपलो होतो. पहाटे ३ वाजताच मला जाग आली.
(रोहणा ... अजिबात बोलू नकोस कोणाला की तूला अवघ्या ३ तासात भूक लागुन जाग
आली) हाताशी जवळच लटकवून ठेवलेल्या समोश्याच्या पिशवीमध्ये हात घालतो तोच
अभि जागा झाला. 'भूक लागली आहे ना रे. दे मला पण एक समोसा.' मी बघतच
बसलो. अभ्याचे हे रूप मला नवीन होते... समोसा खाल्यावर आम्ही पुन्हा झोपी
गेलो. पहाटे अबू रोड आसपास ट्रेन येता-येता आम्ही जागे झालो पण अनुजा मात्र
उठून पुन्हा बसल्या-बसल्या लुडकली होती. स्टेशनवर उतरलो तर सगळीकडे 'रबडी' आणि 'पापडी चाट'वाले
दिसत होते. हातात वेळ नव्हता म्हणुन ती संधी हुकली आणि गाडी अबूवरुन
'फालना'ला निघाली. आम्हाला फालना वरुन 'रणकपुर'ला जायचे होते. तिकडून पुढे
मग ट्रेक होता. आम्ही फालनाला पोचल्याची वर्दी रतनसिंग भाटी यांना दिली आणि
एका जीप मधून रणकपूर जैन मंदिराजवळ असलेल्या बेसकैंपला पोचलो. तिकडे
मुंबईचे काही लोक भेटले. ते ट्रेक पूर्ण करून परतत होते. आम्ही सामान
लावले, जेवून घेतले आणि गप्पा मारात बसलो. संध्याकाळी 'रणकपूर जैन मंदिर' बघायला
गेलो. 'एक्लमटायझेशन' म्हणजे वातावरणाशी समरस होण्याचा तसा काही प्रश्न
नव्हता. तासभर मंदीर बघून कैंप वर परत आलो. ग्रुप मधल्या इतर लोकांशी ओळख
करून घेतली. कोणी बंगालमधले तर कोणी गुजरात, कोणी दक्षिणात्य तर कोणी
उत्तरेकडचे. १८ एकजण होते एकुण. त्यात आम्ही ७ जण 'जय महाराष्ट्र' होतो.
YHAI चे हे एक मस्त असते. अनेक विविध ठिकाणच्या लोकांशी ओळखी होतात.
नव्याने बरीच माहिती कळते. अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे YHAI च्या कुठल्या
ही कैंपला 'कैंपफायर' होत नाही. लाकडे कधीच जाळली जात नाहीत. रात्रीच्या
जेवणानंतर सर्वजण एकत्र जामुन.. 'फायर..फायर..कैंपफायर..' असे
म्हणुन फारतर एखादी मेणबत्ती पेटवून कैंपफायरला सुरवात करतात. आजच्या
गप्पांना काही मज्जा आली नाही. ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण
म्हातारे (विचाराने) आधीच गुडुप झाले होते. आम्ही तासभर दंगा केला आणि १०
वाजता आपापल्या टेंट्स मध्ये जाउन बत्ती गुल केली. पण झोप लागेल तर ना...
का विचारताय... घोरण्याची कोंपिटीशन सुरू होती तिकडे. अशी की आता घोरण्यात
सुद्धा जोरदार भांडतील की काय. डोके उठले होते अक्षरश:. ह्यांच्या बरोबर ५
दिवस राहायचे... एका टेंट/ खोलीत झोपायचे? च्यामारी... बघुया पुढे पुढे काय
होते ते...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
स्वतः
घोरून-घोरून, आमच्या जिवाला घोर लावून आणि आम्हाला जागे ठेवून ते 'घोरटे'
(घोरून आमची झोप चोरणारे म्हणुन घोरटे) निवांतपणे झोपले होते. आम्ही मात्र
उशिरापर्यंत जागे होतो. अखेर रात्री उशिराने कधीतरी आम्हाला झोप लागली. तरी
सकाळी जाग लवकरच आली. हिमालयातील ट्रेक्सप्रमाणे पहाटे लवकर उठून बर्फ
वितळातयच्या आधी जास्तीत-जास्त ट्रेक करायचा असे काही इकडे नव्हते. रात्रभर
'घोरून लढाई' केलेले काही वीर अजून सुद्धा अंथरुणात निपचीत पडलेले होते.
आम्ही उठून आवरून घेतले. आंघोळ करायची नव्हतीच. का काय? डोंगरात आल्यावर डोंगरातले नियम पाळावे लागतात. तेंव्हा नको ते आंघोळ वगैरे करायचे विचार मनात आणायचे नाहीत. आम्ही नाश्त्याची आणि नाश्ता आमची वाट बघत होताच. उदरभरण झाले आणि मग आम्ही निघायची तयारी केली. सॅक्स पाठीवर मारल्या आणि 'मालघाट'कडे
निघालो. रणकपुर पासून मालघाटचे जंगल अवघे ६ किमी लांब आहे. जायचा रस्ता
पक्का डांबरी आहे तेंव्हा आम्ही ट्रक मध्ये बसलो आणि मालघाट जंगलाच्या
गेटकडे निघालो. काही मिनिट्समध्ये मालघाटच्या गेटवर पोचलो. इथपासून १३
किमी. ट्रेककरून संध्याकाळ पर्यंत 'फूटादेवल' याठिकाणी
पोचायचे होते. आता सकाळचे किती वाजले होते ते माहीत नाही पण थोड़े-थोड़े ऊन
लागायला लागले होते. ऐश्वर्याने तिच्या खिशातून एक छोटीशी डब्बी काढली.
त्यात ओठान्ना लावायचे 'फ्रूटफ्लेव्हर बाम' होते. खरंतरं
लावायचे कमी आणि खायचे जास्त... :D निघायच्या आधी मग आम्ही सुद्धा ते
फ्रूटफ्लेव्हर बाम खाऊन.. म्हणजे लावून घेतले.. संजूने भाटीसरांची एक
छोटीशी मुलाखत घेतली. की ट्रेक कसा आहे ... जायचा रूट काय-काय आहे वगैरे
वगैरे .. आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये आम्ही सर्वात तरुण होतो. तेंव्हा आम्ही
पटापट ट्रेक करत पुढे जाऊ आणि ज़रा वयस्कर असलेले थोड़े मागे राहतील असा
भाटीचा अंदाज होता बहुदा. पण हे काय? सुरुवातच आम्ही 'जाऊ दे त्याना पुढे आपण सावकाश जाऊ मागुन आणि कव्हर करू'
ह्या सह्याद्री स्टाइलने केली. आमच्या सर्वांच्या सॅक्समध्ये कपडे कमी आणि
खायचे सामान जास्त भरले होते. शिवाय फालनावरुन घेतलेली केळी आणि मोसंबी
सर्वांच्या साइड पॉकेटला लटकत होती. ती संपवणे गरजेचे होते... तेंव्हा जसा
ट्रेक सुरू झाला तसे आम्ही सुद्धा सुरू झालो. जणू काही ट्रेक फ़क्त १
दिवसाचा आहे ह्या स्पीडने आम्ही खात होतो आणि त्याविरुद्ध ट्रेक बहुदा
१०-१२ दिवस मोठा आहे ह्या स्पीडने चालत होतो. मस्त मज्जा करत. घाई काय
होती. उगाच आपले पुढे पळत जाउन भोज्जा करायचा ह्यात कसली मज्जा येते
लोकांना काय माहीत. आमच्यात पण असे होते काहीजण. अरे लोकांनो ट्रेकची
मज्जा घ्या. निसर्ग बघा. गप्पा टाकत जा. नाहीतर १०-१५ वर्षांनी हे असे
लिहायला घेतले ना की काही आठवणार नाही... :) मग बोलाल अरे हां तेंव्हा तर
१०-१० की दौड़ करून पोचलो होतो नेक्स्ट डेस्टीनेशनला...
वाट
एकदम सोपी होती. मध्येच कच्चा गाडीरस्ता लागायचा. आम्ही निवांतपणे बसायचो.
धमाल गप्पा टाकत पुढे जायचो. आमचा ट्रेक गाईड शिवसिंग बोंबा मारू लागला की
मग थोड़े पुढे सरकायचे. वाट सरत होती... मोसंबी संपत होती... आणि सॅक्स
हलक्या होत होत्या. एके ठिकाणी मध्येच ऐश्वर्याला बीटल्स
दिसले. हिरवे-हिरवे आणि त्यावर काळे ठिपके. ३ जणांचे कुटुंब होते त्यांचे
एक. तिकडे त्यांचे फोटोसेशन झाले. मग ऐश्वर्याला ते उचलून घ्यायची हुक्की
आली. मग त्यांचे तिच्याबरोबर पुन्हा एकदा फोटोसेशन झाले. पुन्हा बीटल्सना
त्यांच्या घरी सोडले अणि आम्ही पुढे निघालो. वळणा-वळणाचा रस्ता हा हळू-हळू
वर चढत होता. पण अगदीच हळू. नाहीतर आपला सह्याद्री. असा चढतो-उतरतो की काय
विचारू नका. ह्या संपूर्ण प्रदेशात तसा पाउस कमी. त्यामुळे आपल्यासारखी
गर्द झाड़ी नव्हती पण थोर वृक्ष मात्र होते. मधुनच पक्ष्यांचे आवाज कानी
पडायचे. याशिवाय एखादा जोक झाला की 'संजू' या प्राण्याचे सुद्धा आवाज
मोठ्याने ऐकू यायचे. आम्ही ७ जण सर्वात शेवटी 'व्यू जंगल पॉइंट'ला
पोचलो. सर्वजण आधीपासून तिकडे जाउन टेकले होतेच. मालघाट जंगलाचे इकडून
मस्त दर्शन होत होते. ज्या रूटने आलो तो थोड़ाफार दिसत सुद्धा होता. ते
दृश्य बघत ज़रा तिकडे विसावलो तर शिवसिंग लगेच म्हणाला,"चलो. थोड़ा आगेही खाना खाने रुकना है. आप पहेले दिनसे ही पीछे, तो पूरा ट्रेक पिछेही रहोगे." मी म्हटले,"शिवसिंगजी हम आगे जानाही नही चाहते. आप चलिए. हम आ जायेंगे."
तो आपला निघाला पुढे. आम्ही फारवेळ गप्पा मारत बसलो नाही कारण दुपार होउन
गेली होती आणि भूका लागल्या होत्या. (इतके खाऊन पुन्हा भूका कश्या लागतात..
काय कळत नाय राव..) जरा पुढे गेलो तर उजव्याहाताला खाली एक ओढा दिसला.
तिकडे सर्वजण जेवत होते. आम्ही सुद्धा मोर्चा तिकडे वळवला आणि ओढयाकाठी
जेवून घेतले. २ वाजून गेले होते. तिकडून पुढे निघालो आणि फुट देवलच्या
दिशेने निघालो. काही वेळात जंगलाची ह्या बाजूची भिंत दिसू लागली.
त्याचबाजुला आमच्या पुढे काही शर्यतीतले ट्रेकर्स दिसत होते. अचानक शिवसिंग
डावीकडच्या एका कच्च्या वाटेने आत घुसला. आम्हाला कळले की हा शोर्टकट आहे.
आम्ही त्याच्यामागून त्या वाटेने अर्धे अंतर वाचवून एकदम पुढे पोचलो. आता
जंगलाची भिंत ओलांडून आम्ही बाहेर पडलो आणि एका टेकडीला वळसा घालून
'फूटादेवल' गावाकडे निघालो. तितक्यात शिवसिंग बोलल. "इस पहाड के बायेसे से जायेंगे. और एक शोर्टकट है. बाकी लोगोंको जाने दो दाये के रास्तेसे"
पहिल्याच दिवशी पठ्याला कळले होते की हे कुठल्या पद्धतीचे ट्रेकर्स आहेत
ते. शिवसिंगने दाखवलेल्या शोर्टकटने आम्ही १० मिनिट्समध्ये गावाच्या वेशीवर
जाउन पोचलो. ते सुद्धा सर्वांच्या पुढे. "कितना स्लो चलते है.. कितना पीछे रहते है" अशी
बडबड करणारे आता गप्प होते. गावात शिरल्या-शिरल्या लगेचच जैनमंदिराबाजुला
असणाऱ्या जागेमध्ये आमची कैंपसाईट सेट केली गेली होती. तिकडे जाउन एका
बाजुला सामान टाकले. एका बाजुला झोपणे सोइस्कर होते कारण रात्री चहुबाजूंनी
हल्ला झाला की आमची काय गत होणार होती ते आम्हाला माहीत होते.
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान'
ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली
होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती
त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला
लागलो. एकेकाची शेपटी ही.... मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे.
नाश्ता हादडला आणि निघणार तितक्यात गावातला एकजण आख्खी टोपली भरून सिताफळ
विकण्यासाठी घेउन आला होता. त्याने ती टोपली खाली ठेवल्या-ठेवल्या आम्ही
बोललो. 'कैसे दिया?' त्याची भाषा जरा राजस्थानी असल्याने काही शब्द आम्हाला कळले नाहीत. मग शिवसिंग बोलला. '१५० रुपया'. आम्ही म्हटले 'काय? फ़क्त १५०?'
त्या टोपलीमध्ये किमान ६०-७० सिताफळे होती. ती सुद्धा चांगली मोठी-मोठी.
आम्ही सर्वांनी मिळून ती टोपली घ्यायची ठरवली. पण बाकीचे ट्रेकर्स रडू
लागले की 'इतना क्या करना है? कौन खायेगा?' मग आम्ही
त्या सर्वांच्या हातावर ४-५ सिताफळे टेकवली आणि बाकी सर्व पैसे देऊन
स्वतःच्या ताब्यात घेतली. हे असे घबाड हातात आल्यावर कोण सोडेल काय...
हेहे.. इतकी सारी घेतली खरी पण ती ठेवायची कुठे हा प्रश्न होतच. मग काही
माझ्या सॅक्समध्ये काही दिपकने एका हातात पिशवीत घेतली. बाकी सर्व आम्ही
तिथल्या तिथे फस्त केली. अखेर ती 'फळे रसाळ गोमटी' खाऊन
झाल्यावर आम्ही ट्रेकरूट वर निघालो. आल्यामार्गे थोड़े मागे जाउन पुन्हा
कालच्या त्या टेकडीला अर्धा वळसा मारत आता पलीकडच्या बाजुला पोचलो आणि मग
तिकडून खालच्या बाजुला डावी मारत पुढे निघालो. आजच्या दिवसात फ़क्त १२ किमी.
ट्रेककरून कुंभळगड़ येथे पोचायचे होते.पल्ला तसा लांबचा नव्हता. तेंव्हा
पुन्हा एकदा आम्ही 'जाऊ दे सर्वांना पुढे' असे म्हणत फुरसत मध्ये
होतो. काही अंतर पुढे जातो न जातो तोच सगळीकडे उशाची शेती दिसू लागली. मला
तर एकदम कोल्हापुरला आल्यासारखे वाटले. ऊस पाहिल्या-पाहिल्या पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'रोहन मला ऊस हवाय खायला' ह्या वेळेला तिच्यासोबत अनुजा सुद्धा उवाच - मला सुद्धा हवाय ऊस.
मग आम्ही सर्वच उसाच्या शेतात शिरलो. पण ऊस काही मिळाला नाही. कारण ज्याचे
शेत होते तो काही तिकडे आसपास नव्हता. तोडून घ्यावा असे मनात आले होते एक
वेळ पण म्हटले नको. पुढे मिळाला की घेउच.
तिकडे
संजू उसाच्या शेता शेजारी असणाऱ्या रहाटावर जाउन बसला. राजस्थानात पाउस
तसा कमीच. तेंव्हा जमीनीखालील पाणी सुद्धा कमीच. असते ते सुद्धा खोलवर.
तेंव्हा इकडच्या विहिरी सरळसोट खोल आणि बांधीव असतात. त्यातून पाणी काढताना
रहाट हाताने खेचायच्या ऐवजी बैलजोड़ी वापरून मोट लाउन खेचले जाते. यामुळे
कमी वेळात जास्त पाणी निघते. हे यंत्र कसे असते ते फोटोमध्ये बघू शकता.
काटकोनात असलेली २ चाके एकमेकात गुंतवली असतात. बैल जसे-जसे गोल-गोल फिरत
लाकडाला बांधलेले वरचे आडवे चाक फिरवतात तसे खालचे चाक उभे फिरू लागते.
ह्या चाकाला समांतर असे दुसरे चाक विहिरीवर बसवलेले असते. त्यावर बसवलेल्या
असतात लोखंडी पटया आणि पाणीवर भरून आणणारे लोखंडी डबे. ही खालची चाके
फिरून-फिरून पाणी वर काढत राहतात. ह्यात २ पद्धती असतात. आपण आधी पाहिली ती
एक आणि दुसरी म्हणजे विहिरीच्या थेट वरती बसवलेले रहाट ह्यात समांतर असे
दुसरे चाक बसवायची गरज नसते. जिथे थेट विहिरीच्या एकदम बाजुला बैल फिरवायला
जागा नसते तिकडे पहिली पद्धत वापरून पाणी उपसा केला जातो. तिकडे १०-१५
मिनिट्स आम्ही 'पाणी उपसा' पद्धत बघत उभे होतो. बाकी बरेच ट्रेकर्स पुढे
चालू पडले होते. आमच्यात बरेच अंतर सुद्धा पडले होते. सर्वात शेवटी आम्ही
तिकडून निघालो आणि मग पक्क्या डांबरी रस्त्यावरुन 'वीरों का मठ' या गावाकडे
निघालो.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता ऊसच-उस होता. पण एक मिळेल तर शप्पथ. ऐश्वर्याचे 'मला ऊस.. मला ऊस..' सुरूच होते. शेवटी म्हटले 'आता त्या शेतात घुस.' जागोजागी ऊस आणि त्याच्या बाजुला बैलजोड़ीचे रहाट. दूरच्या शेतात एक मस्त दृश्य टिपायला मिळाले. आपल्या बैलजोड़ी सोबत शेतकरी रहाटावर पाणी उपसत होता आणि ते पाणी पाटातून वाहत शेताकडे जात होते. ते दृश्य टिपायला मी एकटाच मागे थांबलो होतो. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. काही वेळात मी पुढे जाउन पोचलो तर सर्वजण रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसले होते आणि उरलेली सिताफळे आणि मोसंबी खात होते. कितीही खाल्ली तरी मन भरेना अशी गोड गोड सिताफळे होती ती. बाजुच्या एका गावातली शाळात सुटली होती आणि लहान लहान मूले सर्वांकडे पेन मागत होती. (लडाखमध्ये सुद्धा आम्हाला हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला की मूले खाऊ किंवा पैसे ऐवजी पेन मागत आहेत) आमच्याकडे मात्र त्यांना द्यायला पेन काही नव्हते... :(
तेंव्हा
तिकडून पुढे निघालो. इतक्यात एक पोलिस जीप आमच्या शेजारी येउन थांबली आणि
त्यांनी आम्ही कुठून आलोय, कुठे जातोय हे सर्व विचारले. मुंबईहून आलोय असे
सांगितल्यावर तर काय गप्पाच मारायला लागले. आम्ही अजून मागे-मागे राहू
म्हणुन कसे बसे त्यांना सांगून पुढे सटकलो. ५ मिनिट्स वरतीच वीरों का मठ
होता. हे एक शंकर मंदीर आहे. शिवाय आतमध्ये एक गणेशमंदिर सुद्धा आहे. आम्ही
दर्शन घेउन ज़रावेळ आत विसावलो. मंदिरात वापरलेला दगड आसपास इतके ऊन असुनही
कमालीचा थंड होता. शिवाय मंदिरात एक छोटीशी विहीर होती त्यातले पाणी तर
एकदमच गारेगार. मस्तपैकी फ्रेश झालो आणि पुढे निघालो. दुपारचे २ वाजून गेले
होते आणि जवळचे पाणी पुन्हा संपत येत होते. पण पाणी किती ते प्यायचे...
राजस्थानला आल्यापासून दूध-दही-ताक असे काहीच चाखले नव्हते. ते कुठे मिळेल
का ते आम्ही बघत होतो. नशिबाने पुढच्या गावातच एका घरात आम्हाला दही - ताक
प्यायला मिळाले. झाले असे की आम्ही गावात गेल्या-गेल्या ऐश्वर्याने एका
बाईला विचारले की कुठे ताक-दही मिळेल का. तर ती म्हणाली,"आप यहाँ बैठिये, मै लेके आती हू."
आणि त्या बाईने चांगले हंडा भरून ताक आणि वाडगा भरून दही समोर आणून ठेवले.
अहाहा.. जो काही थकवा होता ते ताक प्यायल्यावर असा पळून गेला. भूका सुद्धा
लागल्या होत्या मग सोबत ड्रायफ्रूट कचोरी असा कोंम्बी जमला. इतके सर्व
होईपर्यंत ती बाई शेतात जाउन नवरयाला जेवण देऊन आली होती. तिला पैसे
द्यायला गेलो तर ती घेईना. 'नहीं नहीं. इसके कैसे पैसे' ऐकेच
ना. मग शेवटी तिच्या पोराला आम्ही खाऊ दिला. तृप्त होउन 'अन्नदाता सुखी
भव' असे म्हणत आम्ही तिकडून निघणार तितक्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या उवाच - 'यहा गन्ना मिलेगा?' त्या बाईने हिला शेतातून ऊस सुद्धा आणून दिला. अखेरची शांत झाली एकदाची ती.
आता कुंभळगड़ अगदीच जवळ आले होते. आम्ही आता 'आरेठ की भागल' या गावातून पुढे निघालो. गावातल्या शाळेसमोर एका पिंपळाच्या झाडावर चिक्कार वटवाघुळे लटकली होती. चक्क दुपार असून सुद्धा. थोड़े पुढे जातो तोच आमचा गाईड शिवसिंग म्हणाला,"यहाँसे आगे जा रहे हे; तो मेरे घर भी चलिए". अरेच्या हे तर त्याचेच गाव होते. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. काहीजण मात्र 'नही-नही हम आगे जायेंगे' करत पुढे निघून गेले. कसे असतात ना काही लोक. तो इतका घरी बोलावतोय आणि हे आपले सुटले आहेत. आम्ही मात्र त्याच्या घरी गेलो. चांगले १ मजले घर होते. खालची खोली बंद होती. बहुदा सामानाची असावी. बाहेर छोटासा गोठा होता. त्यात एक गाय आणि तिचे वासरू होते. आम्ही जीनेचढून वर गेलो. छोटीशी गच्ची होती आणि मागे खोल्या. आम्ही गच्चीवर विसावलो. शिवसिंगने आतून २-३ कटोरी भरून दही आणले. ऐश्वर्याला देत म्हणाला,"ये भी चख के देखिये." मग त्याने बाकीच्यांना सुद्धा दही दिले. इतके गोड दही नाही बा मी चाखले कधी. काही वेळात आम्ही तिकडून निघालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता उसाची शेती संपली होती आणि रस्त्याच्या बाजुला झाडांवर सिताफळे दिसत होती. गावानंतर कच्चा रास्ता संपला आणि आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. कुंभळगड़चा बोर्ड सुद्धा दिसला. थोडेसे पुढे लगेच रस्त्याच्या बाजुला 'लकी होटेल' लागले. आमचा आजचा ठिकाणा हाच होता.
तिकडे
एकुण ३ खोल्या होत्या. २ पुरुषांसाठी तर १ स्त्रीयांसाठी. शिवाय बाहेर
काही खाता टाकल्या होत्या. पण त्या आम्ही येईपर्यंत आधी पोचलेल्या काही
जणांनी पटकावल्या होत्या. आम्ही मग एका खोलीत आमचे सामान ठेवले आणि आसपास
चक्कर मारायला बाहेर पडलो. राजस्थानमध्ये आल्यापासून म्हणजेच ३ दिवस झाले
होते तरी काहीही मांसाहांरी जेवण झाले नव्हते. तेंव्हा इकडे तरी काही मिळते
का ते बघायला खरे तर आम्ही निघालो होतो. जवळच एक छोटेसे दुकान सदृश्य
होटेल दिसले. त्याला विचारले तर माग्गी मिळेल असे म्हणाला. आम्ही आत जाउन
बसलो तर आम्हाला येउन विचारतो कसा. 'कैसे मांगता है? वेज या ......' त्याचे बोलणे देखील पूर्ण न होऊ देता मी त्याच्या छोट्याश्या किचनमध्ये डोकावलो. 'नॉन-व्हेज भी है?' तो उत्तरला,"नही नही. मी पूछ रहा हू व्हेज चाहिए या प्लेन चाहिए.'
हात्तीच्या.. आज सुद्धा काही नॉन-व्हेज मिळायचे नव्हते. थोडीशी खादाडी
करून होटेलवर परत आलो. ७ वाजत आले होते. चहा घेतला आणि कुंभळगड़च्या दिशेने
निघालो.
दररोज रात्री ८ ते ८:३० ह्या अर्ध्या तासात इकडे 'लाईट शो' असतो. पहिल्या रामपोल दरवाजा ते वरच्या बदाम महालापर्यंत सर्वत्र यल्लो लाइट्स लावलेले आहेत. अत्यंत सुंदर दिसतो कुंभळगड़. आपल्याकडे कधी करणार असे टुरिझम देवजाणे. तिकडे अर्धातास थांबुन आम्ही काही फोटो घेतले आणि मग जेवणासाठी होटेलवर परतलो. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होटेल बाहेर रस्त्यावर बसलो होतो. झोपायला म्हणून आत गेलो तेंव्हा घोरण्याचा इतका आवाज येत होता की असह्य झाले होते. शेवटी सामान उचलले आणि बाहेर येउन झोपलो. आत्ता कुठे ९:३० होत होते आणि ह्यांचे फुल ऑन 'घोरायण' सुरू झाले होते. ऐश्वर्या, मनाली आणि अनुजा सुद्धा त्यांच्या खोलीमधून बाहेर येउन आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक माझ्या अंगात काय आले माहीत नाही पण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्या नंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. खरंतरं हां कैंपफायर आयटम होता. संजू, अनुजा आणि ऐश्वर्या इतके जोरात हसत होते की झोपलेले जागे झाले आणि घोरणारे सुद्धा उठले. सत्संग प्रवचन पासून शोलेवाला, आणि डिनर पासून ते न्यूज़ रीडर पर्यंत असे सर्वच्यासर्व आयटम मी १ तास करून दाखवले. संजू पायवर घेउन आणि लोळून-लोळून राक्षसी हास्यासकट फुटला होता. अखेर १०:३० वाजता मुलींच्या खोली मधून एक बाई बाहेर आली आणि तिने कैंपलिडरकडे तक्रार केली. आम्ही म्हटले १०:३० तक तो कैंपफायर का टाइम होता हे सर. पण मग आम्ही झोपून गेलो. त्या एकतासात जी काही मज्जा आली ती पुन्हा नाही आली कधी. मला सुद्धा आता ते सर्व डायलोंग पाठ राहिलेले नाहीत. पुन्हा एकदा राजूचे सर्व एपिसोड बघावे लागतील बहुदा... :D हाहा.. गेले २ दिवस आम्हाला जागे ठेवून स्वतः घोरायण करणारया घोरटयान्ना आज आम्ही जागे ठेवले होते. थोड्या वेगळ्या स्टाइलने. शेवटी ११ वाजता आम्ही गुडुप झालो. सकाळी लवकरच निघायचे होते... कुंभळगड़ बघायला...
.
.पुढील भाग : ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !
ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !
कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. संस्कृत शिक्षक असल्याने एखाद्या घडलेल्या गोष्टीवर मध्येच टिपणी म्हणुन एखादे सुभाषीत सुद्धा सोडायचा तो. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.
आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो.
कुंभळगड़ --- राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या
किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६
नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे.
नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती
संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या
संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त
दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक
मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. (यांना बहुदा
आपल्याकडे फांजी म्हणतात.. आत्ता नक्की आठवत नाही) किल्यात प्रवेश केल्यावर
डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा
मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत
जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत. दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया
रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा
उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात
दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर
आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे. राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि
भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड
मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये
एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ...
७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो.
बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु
नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो.
मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते
असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे
संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.
महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ ...
निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर ...
अवघ्या
३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते.
तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़
बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान
ओमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३
दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ओमलेट नाश्ता
झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची
वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है."
पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि
पुढच्या वाटेला लागलो. आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज
दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या
ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता
जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा
बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी
निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली
उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत
होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी (? ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे
सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे
सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो.
बघता-बघता
अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो
सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची
झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग
आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग
शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत
जेवणाची तयारी केली. यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो. अभि
आणि मनाली बोराच्या झाड़ावर चढून बसले होते तर त्या झाड़ाखाली अनुजा ताणून
देऊन चक्क झोपली होती. तिला जेवण चढले होते बहुदा. दिपक तर विहिरीच्या
काठावर वामकुक्षी घेत होता आणि संजू तोंडाला साबण लावून बसला होता. मी
ह्या सर्वांचे फोटो काढत होतो. पण ऐश्वर्या कुठे होती??? बघतो तर दुसऱ्या
एका बोराच्या झाड़ाखाली ही पोरगी बोरं खात बसली होती. आता काय बोलावे हेच
समजेना... मला माझा मित्र विवेकचे वाक्य आठवले.
आपल्याला २ वेळाच भूक लागते. 'एकदा खाण्याआधी' आणि 'दुसरी खाण्यानंतर'... हे बहुदा ऐश्वर्याला तंतोतंत लागु पड़ते...
ऐश्वर्या... बोरे.. 'आयमिन पुरे' ...
दिपक... ए... दिपक...
संस्कृतपंडित संजू...
तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा
इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ
होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो.
जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक.
थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली
कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही.
आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर
दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी
माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा
चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास
कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते
एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन
पोचलो. गेस्टहाउस मध्ये २ मोठी खोली आणि एक लहान खोली होती. लहान खोलीत २
बेड सुद्धा होते. ते अर्थात मुलींनी पटकावले. आम्ही मोठ्या खोलीत जमीनीवर
अंथरुण घालून सामान सेट करून टाकले. आज बाहेर झोपणे शक्य नसल्याने त्या
खोलीत 'घोरायण' ऐकावे लागणार होते. संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला
बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच
एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये
मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र
होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे
होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ...
बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम
होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे
सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण
झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर
करायला नव्हतेच. तेंव्हा मग पुन्हा 'लाफ्टर चैलेंज राजू' सुरू झाले. काही
वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की
कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट
डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. आम्ही गप्पा टाकत बसलो
होतो तोच त्या गेस्टहाउसचा एक माणूस आला. गच्ची बंद करायची आहे असे सांगून
उगाच आम्हाला खाली पाठवून दिले. कैंपलीडर आम्हाला कैंपफायर सुद्धा करू
देईना. मग अभि भडकला आणि जाउन भाटीला बडबडला. YHAI नॅशनल ट्रेक्समध्ये कसे
कैंपफायर केले जाते, कैंपलीडर सर्वांना कसा त्यासाठी तयार करतो
वगैरे-वगैरे. गच्चीवर नाही तर गेस्टहाउसच्या बाहेरच आम्ही १०:३० पर्यंत
गप्पा मारत बसलो आणि मग झोपायला गेलो. सर्वजण झोपले होते पण मुलांच्या
खोलीत दुसऱ्या दिवशीचे सामान लावत आम्ही चौघे दंगा करत बसलो होतो. शेजारी
घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे
आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो
होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे'
आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ
नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील
त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? ह्या वृत्तीचा... रात्री बऱ्याच उशिराने
आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे
होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
ट्रेकच्या
चौथ्या दिवशी सकाळी अखेर सर्व 'जडबुद्धी' लोकांचे शेवटचे घोराख्यान संपले.
आम्ही उठून निघायची तयारी केली. गेस्टहाउसच्या बाहेर पडलो. जंगलातली सकाळ
म्हणजे कशी एकदम आल्हाददायक ताजीतवानी असते. हळूवार वाहणारे वारे आणि पानांची होणारी सळसळ, त्यामधून येणारे पक्ष्यांचे गुंजन, सर्वच कसे एकदम मनाला नवी चेतना देणारे.
नळावरती थंडगार पाण्याखाली हात घालून तोंड धुवून घेतले आणि ब्रश तोंडात
घातला तर... अररर... हे काय टूथपेस्टच्या जागी झाडपोला मलम...!!! डोळ्यावर
होती-नव्हती ती झोप उडली. सकाळ-सकाळ तोंडाची चव बिघडली. नशीबाने दिपककडे एक
ब्रश होता. मग तो घेतला आणि दात घासले. ख़राब झालेला ब्रश कागदात गुंडाळून
सामानात कोंबला. लक्ष्यात ठेवा... निसर्गात काही म्हणजे काहीही टाकायच्या
विरोधात आहोत आम्ही.
"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."
नाश्त्याला
चक्क पोहे बनवले होते. ते सुद्धा अनुजाने. आज नाश्ता काय आहे ते बघायला
घुसली किचनमध्ये आणि पोहे बघून मग त्याला ज़रा आपला 'होममेड टच' देत बसली.
मस्त झाले होते पोहे. आटपुन तिकडून निघालो आणि 'मुछाला महावीर'कडे
निघालो. आज फ़क्त ३ किमी. ट्रेककरून आमचा प्रवास संपणार होता. तेंव्हा घाई
तशी नव्हतीच. वाट सुद्धा सपाट होती. जंगल विरळ होत चाललेले स्पष्ट दिसत
होते. तासाभरात ट्रेक संपवून बाहेर पडलो आणि 'मुछाला महावीर'कडे मोर्चा
वळवला. हे एक जैनमंदीर आहे. मार्बलवरील अतिशय सुंदर कारागिरी येथे बघायला
मिळते. दर्शन घेउन तिकडून बाहेर पडलो तर बाजुला एक जलजीरा वाला उभा होता.
मग काय म्हटले होउन जाऊ दे एक-एक ग्लास लिंबूपाणी. तिकडून निघालो ते थेट
ट्रकमध्ये बसून पुन्हा बेसकैंपकडे. ४५ मिं.मध्ये रणकपुरला पोचलो. निघायच्या
आधी मस्त पैकी जेवलो. भाटीकडून ट्रेक पूर्ण केल्याची सरटिफिकेट्स घेतली
आणि फालना स्टेशनकडे निघालो. इथ पर्यंत आलोच आहोत तर जाता-जाता 'माउंट आबू'
बघून जाऊ असा प्लान केला होता. फालनाला पोचलो त्या दिवशी १४ नोव्हेंबर
म्हणजे बालदिन होता. ऐश्वर्या आमच्यात सर्वात लहान मग तिचा खोटा-खोटा
वाढदिवस साजरा करायचा कीडा डोक्यात आला. दिपक आणि संजूला खादाडीचे सामान
आणायला पाठवले. ते दहीकचोरी, समोसे, कांदाभजी असा भरगच्च मेनू घेउन आले.
अनुजा स्टेशनवर हातगाडीवाल्याकडून ऐश्वर्याला गिफ्ट म्हणुन एक छोटासा आवाज
करणारा ससा घेउन आली. मग स्टेशन वरतीच तिचा वाढदिवस सेलेब्रेट केला. सोलिड
मज्जा आली. त्यानंतर गाडी यायच्या आत खादाडी पूर्ण केली. दिपक आमच्याबरोबर
येणार नव्हता. तो थेट घरी जाणार होता. त्याला टाटा केले आणि आम्ही आबूला
जायला निघालो. तासाभरात आबूरोडला पोचलो.
स्टेशनला
पोचल्या-पोचल्या थेट धाव मारली ती रबडीच्या स्टालकडे. दही-दुधाचे प्रकार न
आवडणाऱ्या अभ्याने सुद्धा मस्त आडवा हात मारला. उभे-आडवे हात मारल्यावर
तिकडून बाहेर पडलो, एक जीप भाड्याने घेतली आणि थेट पोचलो माउंट आबूला.
तिकडच्या YHAI होस्टेलला पोचायला ज़रा उशीर झाला तर आम्ही सांगून ठेवलेल्या
रूम्स त्यांनी दुसऱ्या कोणाला देऊन टाकल्या होत्या. चायला... मग मिळेल त्या
कुठल्याश्या एका खोलीत आम्ही सेट झालो. ८ वाजत आले होते. संध्याकाळच्या
खादाडीसाठी बाहेर पडलो. नॉन-व्हेज मिळते का कुठे ते बघत बघत एक चाटवाला
सापडला. मग होटेलसाठी पुढची शोध मोहिम होईस्तोवर पोटात काहीतरी असावे असे
सर्वांचे संगनमत ठरले. त्या चाटवाल्याबरोबर बोलता-बोलता कळले की तो आधी
पुण्याला होता. मुंबई-पुण्याकडच्या लोकांना चाट कशी लागते तशी बनवून दिली
एकदम त्याने. व्यवस्थित मराठी येत होते त्याला. नंतर शेजारी असणाऱ्या एका
होटेल मध्ये गेलो. नॉन-व्हेज होते पण बकवास... टेस्टची टोटल वाट लागली.
इकडे गेल्यावर व्हेजच खावे हेच खरे. पोट भरले होते तरीपण मार्केटमधून
आइसक्रीम खाऊन आलो. आज रात्री मात्र 'नो घोरायण'. सर्व कसे शांत-शांत वाटत होते. मला तर बराच वेळ झोप लागेला.. घोराख्यान मिस करतोय की काय असे वाटत होते. अखेर झोप लागली.
सकाळी उठलो आणि आवरून घेतले. आज अर्ध्या दिवसात माउंट आबू मधल्या काही महत्वाच्या जागा बघायच्या होत्या. आम्ही फिरायला एक गाडी केली अणि 'महादेव मंदिर'कडे प्रस्थान केले. तिकडे पोचलो तर बाहेरच एकजण डालिंब घेउन बसला होता. मी आणि ऐश्वर्याने अभिकडे (आमचा खजिनदार...) 'घे.. ना..' ह्या अर्थाने पाहिले. झाली सुरू आजची खादाडी. तिकडून मग ब्रम्हकुमारी मंदिरावरुन पुढे जात 'गुरुशिखर'ला पोचलो. हे राजस्थानमधले सर्वात उंच शिखर आहे. बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी जाते. मग पुढे चढून जावे लागते. पण फारवेळ नाही लागत. शिवाय वाटेवर खायची दुकाने आहेतच. तेंव्हा.....!!! माथ्यावर गुहेमध्ये दत्तात्रयांचे मंदीर आहे. तिकडे दर्शन घेउन खाली उतरलो. सकाळभरात काही जागा बघून आम्ही 'दिलवाडा मंदिर' बघायला पोचलो. आत तशी गर्दी होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरले. आजूबाजुला आपल्याला हवे तसे काही धड मिळेल असे वाटत नव्हते. तरी एका होटेलमध्ये गेलो. त्याच्याकडे डोसा, सांबर, थाळी असे प्रकार होते. मग थोड़ा आडवा हात मारून घेतला. तुम्ही कधी माउंटआबूला गेलात तर 'दिलवाडा मंदिर' न बघता येऊ नाका. येथले सर्वात मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे हे. अतिशय सुंदर कलाकुसर केलेले जैन मंदीर हे ११ व्या शतकात बांधले गेलेले आहे. आतमध्ये एकुण ५ मंदिरे आहेत. आपण आत गेलो की २०-२५ जणांच्या ग्रुपला एक असा माहितिगार देतात. अर्थात तो थोड़ेफार पैसे मागतो पण माहिती मस्त देतो. इकडून मग आम्ही 'अचलगढ़'ला गेलो. हा किल्ला सुद्धा राजा कुंभा यांनी बांधलेला आहे. पण माथ्यावर फार काही राहिलेले नाही. अनुजा आणि संजू तर वरती आलेच नाहीत. खालती खरेदी करत बसले. मी, अभि, मनाली आणि ऐश्वर्या वरती जाउन भटकून आलो. ४ वाजत आले होते. तेंव्हा आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.