http://murkhanand.blogspot.com/2009/11/blog-post_28.html
लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...
मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो... चौलचा मुखरी गणपती आणि रेवदंड्यातला पारनाक्यावरचा मारुती हे माझे आवडते देव...
(मुखरी गणपती)

दर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलो... फार निवांत वाटलं...
११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होता... तोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलो... दताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहे... नक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही...

ह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो...
(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)

डोंगराच्या पायथ्याशी फार मोठ्ठं गोरखचिंचेच झाड आहे... गोरखचिंचेच झाड फार काळ जगतं; ५००-६०० वर्ष तर आरामात आणि भारतात हे झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे... गोरखचिंच खायलापण छान लागते...
(मी आणि गोरखचिंच)

डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत... साधारण ८०० पायऱ्या असतील... वर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात...
(वडाचं फळ)

डोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहे... मंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतात... दरवर्षी दत्तजंयतीला ५ दिवस जत्रा भरते... खूप गर्दी असते तेव्हा...
दर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलो... पुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होती... पोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो...
लहानपणी किल्ल्यात खूप भटकायचो... किल्ल्याच्या भिंतीवर चढायचो... बुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचो... बुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचो... खूप धमाल असायची...
पुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं... १५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला... १६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होता... नंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला... १८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला...
(रेवदंडा कोट)




(किल्ल्यात माडांची वाडी आहे...)

(रेवदंडा किल्ल्याचे अवशेष)

रेवदंडा गाव फार सुंदर आहे... शनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्या... त्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहे... पण "प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका" अशी पर्यटकांना विनंती आहे... आता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेत... त्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे...
"I am myself and what is around me, and if I do not save it, it shall not save me" अशी भावना बाळगली पहिजे...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.