बस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती
‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१
– डॉ.ऐश्वर्या रेवडकर
छत्तीसगडमध्ये मी नव्याने आले तेव्हा येथील जंगल आणि आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अतिशय घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत व येथे अप्रतिम व भव्य धबधबे पहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या कचाट्यात सापडला आहे.
000000000000000000000
प्रत्येक राज्याची, तेथील लोकजीवनाची वेगवेगळी खासियत असते. तेथील भाषा, संस्कृती, आचार-विचार, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, राजकीय वातावरण, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा अनेक घटकांचा तेथील लोकजीवनावर एक ठसा उमटलेला असतो. जेव्हा आपण काही कारणाने त्या भागात जातो, तेव्हा तेथील लोकजीवनाची ठळक वैशिष्ट्ये आपल्या नजरेस आल्याशिवाय राहात नाही. मी पुण्यामध्ये बी.जे.मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. करत असताना, काही विद्यार्थी गट बनवून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेळघाटात जायचे. पुण्यातील ‘मैत्री’ नावाची सामाजिक संस्था मेळघाटात 10-10 दिवसांसाठी वेगवेगळे गट पाठवून पावसाळ्याच्या कालावधीत धडक मोहीम चालवायचे, ज्यामध्ये कुपोषित मुलांचा आहार आणि उपचार, तसेच बाकी रुग्णांना प्राथमिक उपचार पुरवणे असे स्वरूप असायचे. मी सलग 2 वर्षे या मोहिमेत सहभागी झाले होते. या 10 दिवसांच्या अवधीमध्ये मेळघाटातील कोरकू आदिवासी जीवनाचे व त्यांच्या भिन्न संस्कृतीचे जवळून दर्शन व्हायचे. त्याहीपेक्षा जास्त तेथील आरोग्याची गंभीर समस्या पाहून डोळ्यात अंजन घातल्यासारखा अनुभव यायचा. अजूनही हजारो लोकांना किती मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागतेय, हे लक्षात यायचे. मेंदूला विचारांची चालना मिळायची. मी मूळची बार्शी या तालुक्याच्या गावची. त्यामुळे लहानपणापासून ग्रामीण भाग आणि तेथील स्त्रियांच्या आरोग्यसमस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे डिग्रीनंतर जाणीवपूर्वक स्त्रीरोगतज्ज्ञ होण्याचा निर्णय मी घेतला. डोक्यात कुठेतरी ग्रामीण आणि आदिवासी स्त्रिया यांच्यासाठी काम करायचे, हे पक्के रुजले होते. पुण्याच्या पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डी.जी.ओ चे प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील ग्रामीण भागातील स्त्रियांचे आणखी जवळून दर्शन झाले. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्येच राहायचे की काय, असा विचार चालू होता. तेव्हा, सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये संदीप वासेलकर यांचे खूप सुंदर लेख यायचे, मी ते नियमित वाचायचे. त्यावेळी असाच एक लेख वाचनात आला की, ‘तरुणांनी आयुष्यातील काही वर्षे देशासाठी दिली पाहिजेत, सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे.’ तो लेख वाचून माझे मन ढवळले गेले, जुने सामाजिक कामाचे विचार पुन्हा वर आले. शाळेत असताना मी डॉ. अभय बंग या यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकाने मनावर मोठा परिणाम केला होता. त्यामुळे मी ठरवले कि एक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या सामाजिक संस्थेच्या रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचे. तिथे काम करत असताना आदिवासी जीवनाचे जवळून दर्शन घडले. आदिवासी राहणीमान, संस्कृती, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व पाहायला मिळाले. ‘सर्च’मध्ये एक शिकवण मिळाली की, आदिवासींना त्यांच्या संस्कृतीवरून नाकारू नका, त्यांच्या श्रद्धांना चुकीच्या म्हणून बाद करून नका. त्यांना समजून घ्या. त्यांच्या आचार – विचारांशी सुसंगत असे उपचार, आरोग्यविषयक सल्ला त्यांना द्या. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्यामुळे मनावर अनेक सामाजिक संस्कार झाले. ती शिदोरी घेऊनच मी सर्चमधून बाहेर पडले.
त्यानंतर मी छत्तीसगडमध्ये आले, तेव्हा येथील जंगल आणि आणि येथील आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अजूनही घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत व येथे अप्रतिम व भव्य धबधबे पाहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण, या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या, तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या, यांच्या कचाट्यात सापडला आहे. ब्रिटिशांच्या काळापासून चालू असलेल्या शोषणाने येथील आदिवासी नाडला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाले तरीही, बस्तर आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार या मूलभूत सुविधांपासून अजूनही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. मी बस्तर भागातील बिजापूर जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू आदिवासी विश्व माझ्यासमोर उलगडत गेले. रुग्णालयाच्या ए.सी. खोलीत बसून रुग्णाला औषध लिहून देऊन माझे काम संपत नव्हते. तर, माझ्यासमोर येणारी गर्भवती स्त्री कोणकोणत्या अडचणी पार करत माझ्यापर्यंत पोहोचते, हे मला समजून घेणे महत्त्वाचे वाटायचे. आरोग्य हे फक्त औषधे आणि रुग्णालय यापुरते मर्यादित नसते, तर सामाजिक स्थिती, भौगोलिक घटक, राजकीय धोरणे, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व घटकांचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बस्तरमधील सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे जिल्हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहेत. येथील दूरच्या गावांमध्ये सतत काहीना काही घडामोडी होत असतात. काही गावे पूर्णपणे नक्षलींच्या ताब्यात असतात, त्यांच्या परवानगीशिवाय तिथे ये-जा करायला प्रतिबंध असतो. अनेक गावे अशी आहेत की, जिथे दिवसा आपण जाऊ शकतो, परंतु रात्री नाही. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाच्या टीमला लसीकरणासाठी जायचे असते, तेव्हा आधी गावकर्यामार्फत नक्षली लोकांना निरोप पाठवून त्यांची परवानगी घ्यावी लागते, मगच जाता येते. येथील लोकांची रेशनकार्ड, आधारकार्ड त्यांनी जाळून टाकले असल्याने, लोकांना रेशनचे धान्य विकत घ्यावे लागते. त्यांना अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. अनेकदा एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्या, तरी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जायला लवकर परवानगी दिली जात नाही. कारण, नक्षली लोकांना नेहमी भीती असते की, गावातील लोक त्यांची खबर पोलिसांना देतील.
बहुतांश आदिवासी लोक जंगलात छोट्या छोट्या, दूरवर वसलेल्या गावात राहातात. जी आतली गावे आहेत, तिथे अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी गर्भवती स्त्री कित्येक किलोमीटर चालून, जंगल पार करून मुख्य रस्त्यापर्यंत येते, तेथून मग तिला वाहन मिळते. कित्येक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा प्रसूती वेदना सुरू झालेल्या स्त्रीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी खाट उलटी करून तिची डोली बनवली जाते आणि त्यातून रुग्णाला खांद्यावर वाहून नेले जाते. पावसाळ्यामध्ये आणखी समस्या निर्माण होते. कारण, अनेक नद्या-नाले असलेल्या या प्रदेशात जास्त पाऊस होतो, तेव्हा रस्ते बंद होऊन जातात आणि गाव इतर गावांपासून तुटते. अनेकदा अशा परिस्थितीत रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाही आणि उशीर झाल्याने रूग्णाची स्थिती गंभीर होते. रुग्णवाहिका चालवणारे लोक अनेकदा धाडस करून नदी नाल्यांना पूर असतांना पाण्यातून गाडी चालवतात आणि रुग्णाला घेऊन येतात. एखादी अडलेली प्रसूती असेल, तर बर्याचदा ती गर्भवती स्त्री रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप वेळ लागल्याने तिचे गर्भाशय फुटते व तिच्या जिवाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात अशा केसेस नेहमीच येतात. अशावेळी डोके शांत ठेवून आणि सर्व कसब पणाला लावून, शस्त्रक्रिया करून, अशा स्त्रियांचा जीव आमची जिल्हा रुग्णालयाची टीम वाचवते. प्रत्येक स्त्रीची वेगळी समस्या आणि वेगळीच कहाणी. या सर्व स्त्रिया रुग्णालयात येतात, तेव्हा माझ्या लेकीच बनून जातात आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवायची वेळ येते, तेव्हा मला जणूकाही त्यांना सासरी पाठवते आहे, अशी भावना मनात येते.
दर रविवारी मी बिजापूर जिल्हा रुग्णालयापासून 35 किलोमीटरवर असणार्या कुटरु या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी जायला सुरुवात केली. भीतीमुळे या भागातून खूप कमी रुग्ण जिल्हा रुग्णालयात यायचे. परंतु मी तेथे जायला लागल्यापासून हळूहळू रुग्णांचा डॉक्टरांप्रति विश्वास वाढू लागला. मला शोधत शोधत गर्भवती स्त्रिया बिजापूरला येऊ लागल्या. कुटरुपासून 20 कि.मी.वर असणारे बेदरे गाव पावसाळ्यात जगापासून पूर्ण तुटून जायचे. पावसाळ्यानंतर मग तेथील स्त्रिया मला कुटरुमध्ये भेटून कोणा-कोणाची प्रसूती झाली, मुलगा झाला की मुलगी, हा वृत्तांत द्यायच्या. आदिवासी लोकांत मुलगा पाहिजेच, असा हट्ट नसतो. इथे नवजात शिशु आणि बालक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तसेच संतती प्रतिबंध उपायांबाबत फारशी जागरूकता नाही. त्यामुळे एकेका स्त्रीला 5-10 पर्यंत मुले झालेली पहायला मिळतात. कुटरुला गर्भवती स्त्रियांची तपासणी करत असताना, मी त्यांना कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती द्यायचे. नसबंदी शस्त्रक्रियेबद्दलही सांगायचे. तेव्हा त्यांना विश्वास वाटायचा आणि मग त्या बिजापूर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी यायच्या. असेच एके दिवशी मी बिजापूरला ओपीडीमध्ये रुग्ण तपासत असताना, कुटरुच्या 4 स्त्रिया मला शोधत आल्या. चारही जणींनी स्थानिक मद्य महुआ हे पिले होते आणि त्यांनी मला विनंती केली की, लगेच त्यांना मी भरती करून त्यांची शस्त्रक्रिया करावी आणि संध्याकाळी त्यांना घरी पाठवून द्यावे. शस्त्रक्रिया करताना वेदना होऊ नये म्हणून त्यांनी मद्य पिले होते. मग मला त्यांना समजवावे लागले की, आधी त्यांची रक्त तपासणी होईल आणि दुसर्या दिवशी सकाळी, उपाशी पोटी, त्यांना बेशुद्ध करून, वेदनारहितपणे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल. मग कसेतरी त्यांना पकडून मी नर्सच्या ताब्यात दिले.
अशा या आदिवासी स्त्रिया निसर्गकन्या असल्याने एक वेगळेच सौंदर्य त्यांच्या चेहर्यावर दिसते. मेहनत करणारी, अत्यंत सहनशील असलेली आदिवासी स्त्री म्हणजे एक अद्भुत रसायन असते. अशा स्त्रीवर उपचार करताना तिच्या सहनशीलतेने मी आश्चर्यचकित होते. या स्त्रिया आजार अनेक दिवस अंगावर काढतात. या भागात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. शरीराच्या एखाद्या भागात दुखत असेल, तर गरम वस्तूने डागण्या दिल्या जातात. अगदी नवजात बाळालाही असे डागलेले पहायला मिळते. स्त्रीला पाळीचा त्रास असेल, अंगावरून जास्त रक्त जात असेल तर कदाचित कोणीतरी काळी जादू केली आहे, असा त्यांचा समज होतो. अनेक दिवस त्रास कमी झाला नाही, तरच रुग्णालयात आणले जाते. प्रसूतीसुद्धा घरीच केली जाते, काही समस्या आली, तरच रुग्णालयात आणले जाते. कुटुंब नियोजनासाठी किंवा गर्भपातासाठी जंगली जडीबुटी वापरली जाते, त्याचा फारसा उपयोग होत नाही. कुपोषण आणि रक्तक्षय तर येथे खूपच जास्त प्रमाणात आढळतो. हिमोग्लोबिन 2 ग्राम इतके कमी असलेल्या गर्भवती स्त्रियाही नित्याची बाब आहे. त्यात मलेरियामध्ये आणखी रक्त कमी होते. या भागात मलेरिया, डेंगू, सिकलसेल, अॅनिमिया हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. गर्भवती स्त्रीच्या नियमित तपासणीबद्दलही जागरूकता नसल्याने अनेकदा समस्या निर्माण झालेली गर्भवती स्त्री प्रसूती व उपचारांसाठी रुग्णालयात येते, तेव्हा तिच्याकडे कुठल्याच तपासणीचे रिपोर्ट्स नसतात. एकदाही सोनोग्राफी झालेली नसते. त्यामुळे या भागात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे खूप आव्हानात्मक आहे. अपुर्या संसाधनांमध्ये, सर्व निर्णय तुम्ही एकट्यानेच घेऊन, सर्व मेडिकल ज्ञान आठवून उपचार करावे लागतात. जे आजार मी पूर्वी पुस्तकातच वाचले होते व जे महाराष्ट्रात कधीच दिसून येत नाहीत, असे आजार येथे पाहायला मिळाले व उपचारही करावे लागले. त्यामुळे माझ्या कौशल्यांमध्ये पुष्कळ भर पडली.
माझे एम.बी.बी.एस. चे सीनियर डॉ. अय्याज तांबोळी सर आय.ए.एस.झाल्यानंतर छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 2016 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. स्वतः डॉक्टर असल्याने अय्याज सरांनी जिल्हा रुग्णालय सुसज्ज बनवले, सर्व सुविधा सुरू केल्या आणि अनेक नवीन डॉक्टरांची भरती केली. मीही अय्याज सरांमुळेच छत्तीसगडला आले. अय्याज सरांनी आरोग्य सुविधांसोबतच शिक्षणक्षेत्र, रोजगार, रस्ते निर्माण या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती घडवून आणली आणि बिजापूर जिल्ह्याचा खर्या अर्थाने विकास झाला. काम करताना कोणत्याही डॉक्टरला कधीही काही समस्या आली, तर अय्याज सरांशी चर्चा होऊन ती सोडवली जायची. मला कधीही घराची आठवण येऊन एकटे वाटले, तर सरांशी गप्पा मारून ताण कमी व्हायचा. अय्याज सरांनी बिजापूरला स्पोर्ट्स अकादमीही सुरू केली, जिथे 8 वी ते 12 पर्यंत मुला-मुलींना धनुर्विद्या, मार्शल आर्ट्स, बेसबॉल, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या 9-10 खेळांच्या प्रशिक्षणासोबत वसतिगृहाचीही सोय झाली. या अकादमीमुळे अनेक मुले-मुली विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली, काहीजण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले. बिजापूरमधील अनुभव आणि अय्याज सरांशी झालेल्या गप्पांमधून मी साप्ताहिक ‘साधना’मध्ये नियमित लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यातून माझे ‘बिजापूर डायरी’ हे पुस्तक आकारास आले.
रुग्णालयातील काम संपवून मी विविध गावांतील ‘हाट बाजार’ पहायला जायचे. इथे जिल्ह्याच्या आजूबाजूची जी गावे आहेत, तिथे आठवड्यातील एक दिवस बाजार भरतो, त्याला हाट बाजार म्हणतात. या बाजारात दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू भेटतात. म्हणजे किराणा, फळे, भाज्या, चप्पल, कपड्यांपासून शेतीत लागणारी खते, बियाणे, मातीची व धातूंची भांडी, खोटे दागिने, मासे पकडायचे जाळे इत्यादी सर्व. शिवाय, काही ठिकाणी शिवणकाम करणारा टेलरही त्याची शिलाई मशीन घेऊन बसलेला असतो. अशा बाजारात मी रमून जाते. जंगलातील विविध कंदमुळे येथे पाहायला मिळतात. तसेच, नदीत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासेही पाहायला मिळतात. इथे ‘सुक्शी’ नावाचा प्रकार लोकांचा खूप आवडता आहे. सुक्शी म्हणजे ऊन्हामध्ये सुकवलेले मासे. रोजच्या भाजीमध्ये किंवा वरणात ही सुक्शी चव येण्यासाठी वापरली जाते. बाजाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे अजूनही वस्तूविनिमय चालतो. म्हणजे आदिवासी लोक आपल्याकडचा काही माल, उदाहरणार्थ गोळा केलेली चिंच, महुआ देऊन, त्या बदल्यात दुसरा माल घेतात, बर्याचदा त्यांना बदल्यात मीठ दिले जाते. बाजाराचे आणखी एक आकर्षण म्हणजे, स्थानिक मद्ये. बस्तरमधील विविध मद्ये खूप लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत. महुआच्या फुलांपासून बनवलेले महुआ हे मद्य, सल्फीच्या खोडातून ताज्या रसासारखी मिळणारी ‘सल्फी’, खजुराच्या झाडाचा ‘छिंदरस’, तांदळापासून बनवला जाणारा ‘लांदा’, ‘ताडी’. बाजाराच्या एका बाजूला अनेक बाया मोठ्या हंड्यांमध्ये, काही बाटल्यांमध्ये ही मद्ये घेऊन बसलेल्या दिसतात. झाडाच्या पानाच्या द्रोणामध्ये मद्य दिले जाते. आदिवासी भागात मद्यपान हे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांपासून म्हातार्या लोकांपर्यंत सर्व कुटुंबीय एकत्र बसून मद्याचा आस्वाद घेतात. प्रत्येक सणाला किंवा लग्न वा इतर घरगुती कार्यक्रमात घरीच ही ताजी मद्य बनवली जातात आणि दिवसभर पाहुण्यांना दिली जातात. तुम्ही जर गावात कोणाच्या घरी जेवायला गेलात, तर सुरुवातीला पाहुणचार म्हणून ‘महुआ’ किंवा ‘सल्फी’ किंवा ‘लांदा’ दिला जातो. ते न पिणे म्हणजे, त्यांना अपमान वाटतो.
येथील खानपानामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहायला मिळते, ते म्हणजे ‘चापडा’ चटणी. ही लाल मुंग्यांची चटणी असते. मुले जंगलात फिरताना झाडावर चढून लाल मुंग्या शोधून भांड्यात गोळा करतात. बाजारात सुद्धा मोठ्या पानावर असलेल्या लाल मुंग्या आणि त्यांची अंडी विकत मिळतात. लाल मुंग्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मलेरिया बरा होतो, असा इथे समज आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी, पक्षी आदिवासी भागात खाल्ला जातो. अनेकदा रस्त्याने जाताना गलोर किंवा कधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघालेले आदिवासी तरुण पहायला मिळतात. मध्ये दंतेवाडामध्ये प्रशासनाने एक आवाहन केले की, गलोर सोडून द्या आणि पक्ष्यांची, छोट्या प्राण्यांची शिकार थांबवा. इथे उंदीरसुद्धा आगीत भाजून खूप आवडीने खाल्ले जातात. एकदा माझ्या मित्राच्या शाळेच्या बाजूला एक उंदीर निघाला, तर 15-20 लोक त्याला पकडण्यासाठी काही तास प्रयत्न करत राहिले. बारसुरजवळ अबुजमाड नावाचा मोठा डोंगराळ भाग आहे. अबुज नावाचा अर्थ अनाकलनीय. हा भाग म्हणजे नक्षली लोकांचा बालेकिल्ला समजला जातो. येथे अजूनही प्रशासन पोहोचू शकले नाही. इथे जाणे धोकादायक असून, नक्षली लोकांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही की, तेथून बाहेर येऊ शकत नाही. वर्षातून महाशिवरात्रीच्या 1-2 दिवशी मात्र येथे प्रवेश करायला पूर्ण परवानगी असते. येथे आतमध्ये, बारसुरपासून 25 किमी आत घनदाट जंगलात ‘तुलार गुफा’ आहे, जेथे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 2019 साली मी येथील डॉक्टरांच्या टीमसोबत तेथे गेले होते. आम्ही 15-20 लोक बाईकवरून गेलो होतो, रस्त्यात जवळजवळ 15-16 नदी नाले पार करावे लागले. काहींच्या बाईक रस्त्यात खराब होऊन बंद पडत होत्या. रस्ता अगदी निबिड. अनेक आदिवासी चालत येतात. दूरवर गूढ संगीत घुमत होते. गुहेसमोर आदिवासी पारंपरिक वेशभूषेमध्ये संगीताच्या तालावर नृत्य करत होते. या गुहेला भेट देणे म्हणजे, एकदम अश्मयुगाची आठवण करणारा थरारक अनुभव होता. हा भाग पाहिल्यावर लक्षात येते की, याचे ‘अबुजमाड’ हे नाव अगदी सार्थ आहे.
आपल्यापेक्षा भिन्न असलेले, अजूनही जुन्या चालीरीती सांभाळणारे हे आदिवासी विविध अन्यायाने, शोषणाने दबून गेले आहेत. येथील जंगलात खनिजांचे मोठाले साठे आहेत. त्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या जमिनी बळकावतात आणि आदिवासींची घरे असलेली जंगले उद्ध्वस्त केली जातात. जो आदिवासी जंगलाचा राजा असतो, तो खाणीमध्ये मात्र कमी पैशावर राबणारा मजूर बनून उरतो. खाणीमध्ये काम केल्याने फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य कमी होते. या कंपन्यांच्या विरोधात आदिवासींचा आवाज सरकारकडून दाबला जातो. यामुळेही अनेक तरुण-तरुणी नक्षली चळवळीकडे खेचले जातात. काश्मीरनंतर सर्वात जास्त लष्कर छत्तीसगडमध्ये आहे. लष्कराने व्यापलेल्या भागात नागरिकांचे विविध प्रकारे शोषण होते, जसे की, नक्षल असल्याच्या संशयावरून अनेक निष्पाप आदिवासींना तुरुंगात डांबले जाते. केस लढवायला, वकील द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. कित्येक वर्षे, कुठल्याही पुराव्याशिवाय आदिवासी केवळ संशयावरून तुरुंगात खितपत पडतात. खोटी चकमक दाखवून अनेक निर्दोष आदिवासींना मारले जाते आणि नंतर त्यांना नक्षल म्हणून घोषित केले जाते. 2012 साली जून महिन्यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील सारकेगुडा या गावात आदिवासींचा सण बीजपंडुम साजरा होत होता. रात्रीच्या वेळी गावकरी एकत्र जमून लोकल दारूचा स्वाद घेत नृत्य-गाणे चालू होते. कोणाकडेही कसलेही शस्त्र नव्हते. पोलिसांनी अचानक येऊन या निशस्त्र जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. यात एकूण 17 आदिवासी, ज्यात 7 अल्पवयीन मुलेही होती. यात दहावीमध्ये शिकणारा, शाळेत प्रथम आलेला व शासनाने पाठ थोपटलेला गुणवंत आदिवासी विद्यार्थी होता. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रात मोठ्या बातम्या आल्या की, पोलिसांनी कुख्यात नक्षलवाद्यांना मारले. आदिवासी लोकांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात न्यायालयीन लढाई चालवली. त्यात अनेक मानवी अधिकारवाल्यांनी त्यांना मदत केली. आशुतोष भारद्वाज या ‘इंडियन एक्स्प्रेसच्या’ पत्रकाराने मृत आदिवासींच्या पोस्टमार्टेमचे पुरावे गोळा केले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, मारले गेलेले हे आदिवासीच होते, नक्षलवादी नव्हते. अशा खोट्या एनकाऊंटरच्या घटना इथे नेहमी घडत असतात. स्त्रियांवर, शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार होतात. अत्याचार करून कधी त्या मुलीला वा स्त्रीला मारून टाकले जाते व नंतर नक्षलवादी म्हणून घोषित केले जाते. या आदिवासींच्या बाजूने जे कोणी उभे राहील, त्या व्यक्तीला सतत पोलिसांची भीती राहते. तरीही, काही मानवाधिकार कार्यकर्ते इथे जिद्दीने आदिवासींसाठी काम करतात, ज्यात व्यवसायाने वकील असलेल्या बेला भाटिया या आदिवासींच्या केसेस लढतात.
इतक्या सार्या समस्यांनी ग्रस्त अशी आदिवासी स्त्री माझ्या पुढ्यात येते, तेव्हा अगदी आतून कळवळा येतो. यांच्यासाठी कितीही काम केले, तरी कमीच आहे. त्यामुळे येथे सेवा देण्यात एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, जे आयुष्याला अर्थपूर्ण बनवते. आदिवासींची गोंडी ही भाषा समजायला खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे तेलगू, हलबी या भाषाही बोलल्या जातात. यातील हलबी भाषा मराठीशी भरपूर मिळती जुळती असल्याने लगेच समजते व बोलताही येते. गोंडी आदिवासींशी संवाद करायला मात्र ‘मितानीन’ ची मदत घ्यावी लागते. ‘मितानीन’ या गोंडी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मैत्रीण. आपल्याकडे जशा आशा वर्कर्स असतात, तशा छत्तीसगडमध्ये गावातून काही चाणाक्ष, कामसू महिलांना निवडून आरोग्यप्रशिक्षण दिले जाते, त्यांना ‘मितानीन’ म्हटले जाते. गावातील गरोदर महिलांची माहिती गोळा करणे, मलेरिया तपासणे, छोट्या आजारांवर प्राथमिक उपचार देणे, गंभीर आजारी रुग्णाला दवाखान्यात घेऊन येणे अशी कामे या मितानीन पार पाडतात. एकटीने दवाखान्यात यायला घाबरणारी आदिवासी गरोदर स्त्री मितानीनसोबत तपासणीसाठी व प्रसूतीसाठी विश्वासाने येते. मितानीन सोबत असली की, आम्हाला रुग्णांशी संवाद करणे सहज सोपे होऊन जाते आणि चांगल्या संवादामुळे स्त्रियांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो. मितानीन या छत्तीसगडच्या यशस्वी प्रयोगासारखा आणखी एक प्रयोग म्हणजे हाट बाजार क्लिनिक. बर्यापैकी मोठ्या असणार्या गावात आठवडी बाजार लागतो, तेव्हा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांत, जंगलात राहणारी कुटुंबे या बाजारात वस्तूंची खरेदी करायला, स्वतःकडील भाज्या, फळे, धान्य विकायला येतात. आठवड्याचा हा बाजार सर्व आदिवासींसाठी छोटेखानी सणावारासारखा असतो, सर्वजण यानिमित्ताने एकमेकांना भेटतात. सरकारच्या लक्षात ही बाब आली. मग नर्सचे एक पथक बनवून या बाजारात छोटे क्लिनिक लावले जाते, ज्यात गर्भवती स्त्रियांची नोंदणी, लसीकरण, छोट्या आजारांचे उपचार या सुविधा उपलब्ध करवल्या जातात. हा प्रयोग पूर्ण छत्तीसगडमध्ये यशस्वीरीत्या अजूनही चालू आहे. याद्वारे लसीकरणामध्ये चांगलीच वाढ झाली.
इथे काम करणे ही फक्त सेवाच नाही, तर शिकणेसुद्धा आहे. आपण आदिवासींना फक्त देत नसतो, तर त्यांच्याकडूनही भरपूर काही घेत असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, हे एकतर्फी नाहीये, ही टू वे चालणारी प्रक्रिया आहे. इथे काम करून माझ्यामध्ये मोठा बदल घडून आला. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत गेली. येथे मला अनेक तरुण-तरुणी भेटले, जे आदिवासींसाठी विविध क्षेत्रात काम करत आहेत. मूळचा आंध्र प्रदेशचा असलेला प्रणित सिन्हा हा तरुण 8 वर्षांपूर्वी येथे शिक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी आला आणि येथेच रमला. ‘बचपन बनाओ’ या नावाने सामाजिक संस्था सुरू करून तो दंतेवाडा जिल्ह्यात आदिवासी मुलांसाठी शिक्षण कसे चांगल्या प्रकारे देता येईल, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम पाहतो आणि एका आदिवासी गावात ‘सपनो की शाला’ या नावाने शाळाही चालवतो. महाराष्ट्रातील नाशिकचा असलेला आकाश बडवे हा चांगल्या पगाराची नोकरी सोडून दंतेवाडामध्ये आला आणि त्याने येथील आदिवासी गावांतील शेतकर्यांची जैविक शेती करणारी, ‘भूमगादी’ या नावाची संस्था सुरू केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारी माझी मैत्रीण ऋतुगंधा व मित्र सागर हे दोघे काही महिन्यांपूर्वी आकाशच्या कामात सामील झाले आहेत. जीतसिंग आर्य हा तरुण बस्तरमध्ये पर्यटन व्यवसायाचे काम करतो. बस्तर हा भाग नक्षली कारवायांमुळे कुख्यात आहे. परंतु, या भागाला निसर्गाचे वरदानही लाभले आहे. भव्य नद्या आणि त्यावरचे भव्य धबधबे हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथील आदिवासी तरुण-तरुणींना गाईड बनण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करणे, यावर जीत काम करतो. या सर्व मित्र -मैत्रिणीचे मिळून आमचा इथे चांगला ग्रुप बनला आहे. विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे काम पाहून प्रेरणा घेणे, एकमेकांना मानसिक बळ पुरवणे यासाठी या ग्रुपची खूप मदत होते.
———————————————-
(लेखिका छत्तीसगढमध्ये अनेक वर्षापासून आदिवासी व नक्षल भागात वैद्यकीय सेवा करतात.)
9399967725
"यावर्षी इयरएन्डला कुठे जायचं फिरायला?"
ऑक्टोबरच्या एका दुपारी आमच्या पुण्यातल्या घरात सुरु असलेला संवाद.
"हं .. !"
माझा एकाक्षरी प्रतिसाद.
तुझ्या लेकीच्या शाळेला ख्रिसमसची ८ दिवस सुट्टी आहे त्यातच अड्जस्ट झालं
तर उत्तम.. !" आई म्हणाली. "रंजू मावशी कधीची बोलावते आहे रायपूरला. जायचं
का?" गणपतींनंतर आई माझ्याकडे मुक्कामाला आली असता चाललेली प्लॅनिंग .
"बघू ....!"
"अगं बघू काय बघू, तुझ्याशी बोलते आहे." मला लॅपटॉप मध्ये डोकं घातलेलं
बघून माँसाहेब जरा जोरातच म्हणाल्या. "जायचं का रायपूरला?" मग मात्र 'वर्क
फ्रॉम होम' जरा बाजूला सारून या 'होम वर्क' मध्ये भाग घेणे गरजेचे झाले.
"रायपूर... ? मी जरा विचार करत म्हटले. "हो अगं, रंजू मावशीकडे राहूया दोन दिवस आणि काही जवळपास असेल तर करूया थोडी भटकंती." इति उत्साही आईसाहेब. वय वर्षे ६६. "ठीक आहे. बघू जमतंय का" एवढे बोलून मी पुन्हा लॅपटॉप मध्ये डोळे घातले.
हो नाही करता करता रायपूरला जाण्याचे नक्की झाले आणि मग प्रवासाची आखणी
करायला घेतली. माझ्यापेक्षा जास्त उत्साही घरातले दोन मेम्बर्स होते. आई
आणि माझी लेक विजयालक्ष्मी, वय वर्षे ६.
रंजूमावशीला तात्काळ फोन लावला गेला आणि "डिसेंबर मध्ये येत आहोत,
प्रोग्रॅम कन्फर्म" असे शिक्कामोर्तब झाले आणि आईसाहेबांनी २ दिवसांनी
नागपूरसाठी प्रस्थान ठेवले.
रायपूरपासून जवळपासची / आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे कोणती, तेथे पोचण्याची साधने काय, प्रवासाचे अंतर किती आणि कसे कापायचे यावर गूगलबाबाच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. तसेच आणखी एक नियम यावेळी आम्ही आम्हालाच घालून घेतला कि शक्य तितक्या कमी खर्चात हि ट्रिप आखली गेली पाहिजे. तरीदेखील कोणत्या प्रवासी कंपन्या अश्या टूरचे आयोजन करतात का याचा पण आढावा घेतला. म्हणजे प्रवासी कंपन्या आपल्या पॅकेजमध्ये काय काय सुविधा देतात. कोणत्या ठिकाणांचा समावेश करतात हे एकदा कळले कि आपण त्यानुसार स्वतः व्यवस्थित आखणी करू शकतो.
जगदलपूर मध्ये २ दिवस २ रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले आणि मेक माय
ट्रिप (MMT), अगोडा, GOIBIO या वेबसाइट्स वापरून मुक्कामासाठी योग्य ठिकाणे
बघायला सुरवात केली.
तसेच नागपूरची एक टुरिस्ट कंपनी 'श्री गजानन ट्रॅव्हल्स' बस्तरची ६ दिवसीय
ट्रिप आयोजित करते असे समजले. लगेच त्यांना संपर्क साधून माहिती पत्रके
मागवलीत. त्यांने तत्परतेने माहिती तर पुरवलीच पण श्री राहुल चांदुरकर
स्वतः नागपूरच्या घरी आईची भेट घ्यायला आलेत. त्यांना आम्ही केवळ
माहितीसाठी संपर्क साधतो आहोत असे स्पष्टपणे सांगितले तरी देखील अत्यंत
अगत्याने सर्व प्रवास आखणीसाठी मदत तर केलीच शिवाय ते स्वतः आमच्या
ट्रीपच्या दिवसांतच त्यांच्या कंपनीच्या 'बस्तर-टूर' सोबत आहेत तर काही
अडचण आल्यास "विनासंकोच संपर्क करा" असे सांगून लागेल ती मदत देण्याची
तयारी दर्शवली.
मिळवलेल्या सगळ्या माहितीनुसार सिरपूर, जगदलपूर, कांकेर आणि तिरथगड या ठिकाणांना भेट देण्याचे निश्चित केले. रायपूरला पोचल्यावर थेट जगदलपूर, तिथून दुसऱ्या दिवशी कांकेर येथे कूटूमसर गुहा आणि तिरथगड धबधबा करून रात्री परत जगदलपूर आणि तिसऱ्या दिवशी जगदलपूर शहर आणि चित्रकोट धबधबा पाहून रायपूरसाठी प्रस्थान. चौथ्या दिवशी सिरपूर या रायपूर जवळील प्राचीन जैन मंदिर समूह आणि पुरातात्विक उत्खननाच्या स्थळाला एकदिवसीय भेट आणि सायंकाळी रायपूर शहर दर्शन व थोडीफार स्पेशल खरेदी/खादाडी करून पाचव्या दिवशी नागपूरला परत असा ढोबळ कार्यक्रम आखला गेला. आणि मित्रमंडळींसमोर ट्रिपचा डंका वाजवला ...
काही प्रतिक्रिया अपेक्षित तर काही अनपेक्षित.
"बस्तरला जातायत? त्यातही जगदलपूर? लाईफ इन्शुरन्स केलाय ना?" एक काळजी.
"अरे कशाला त्या नक्षलग्रस्त भागात जाताय? दुसरी ठिकाणे नाहीत का?" एक विचारणा
तर काहींचे म्हणणे कि "बिनधास्त जा, काही धोका नाही. अविस्मरणीय सहल होईल".
वेगवेगळी मते आणि मतांतरे.. पण 'अतिशय सुंदर प्रदेश आहे' यावर मात्र एकमताने शिक्कामोर्तब.
रायपूर मध्ये मुक्काम कुठे करावा हा प्रश्नच न्हवता. मला स्वतःला खरंतर कोणाच्या घरी जाऊन राहायला अवघड वाटतं पण इथे मावशीचं घर असल्याने व ती तेथे एकटीच रहात असल्याने तसा संकोच न्हवता. शिवाय रायपूरला पोहचल्या दिवशीच रात्री पुढे जगदलपूरला निघायचे होते.
जगदलपूर मधील २-३ हॉटेल्स निवडून प्रत्यक्ष बुकिंग करण्याआधी त्यांना फोनवर संपर्क केला. कारण तेच... वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे 'जगदलपूरमध्ये फिरणे किती सुरक्षित?' असा किडा डोक्यात वळवळायला सुरवात जी झाली होती. त्यात बरोबर दोन जेष्ठ नागरिक स्त्रिया आणि एक लहान मुलगी. नाही म्हणलं तरी जरा काळजी वाटत होतीच. पण फोनवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शंकांचे निरसन झाले. शिवाय प्रत्येक हॉटेल ज्या वेगवेगळ्या सुविधा देतात त्याबद्दल पण माहिती मिळाली. सरतेशेवटी राहण्यासाठी 'हॉटेल नमन बस्तर' ची निवड केली. आणि दि. २७-१२-२०२२ रोजीचे ३ adults १ child साठी बुकिंग केले.
आता तिकीट बुकिंग चा दुसरा टप्पा... माझा आणि लेकीचा प्रवास सुरु होणार
पुण्यातून. नागपूरला घरी ख्रिसमस एन्जॉय करून व दोन दिवस थांबून आईसोबत
पुढच्या प्रवासासाठी नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसचे आरक्षण केले. २६
डिसेम्बरची सकाळी ६:१५ ची रेल्वे. रायपूरला पोचणार दुपारी ११:०० वाजता. तो
दिवस मग रंजू मावशी कडे घालवायचा असे ठरले. पुढे रायपूर-जगदलपूर हया ३००
कमी अंतराच्या प्रवासासाठी बस, रेल्वे आणि विमान हे तिन्ही पर्याय उपलब्ध
आहेत. रायपूरहून रोज दुपारपासून दर १५ मिनिटांच्या अंतराने बसेस आहेत ज्या
सर्वसाधारणपणे साडेसहा ते सात तासांत हे अंतर कापतात. तसेच दुर्ग-जगदलपूर
एक्सप्रेस हि रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावते पण हि गाडी एवढे अंतर
कापायला १४ तास घेते आणि पार ओडिशामधून फिरवून आणते. राहता राहिले विमान.
तर दररोज एक alliance एअरलाईन्सची ५५ मिनिटांची फ्लाईट असल्याचे कळले पण
त्यांचे नेटवर रिव्युज काही खास न्हवते व अनेकदा त्यांच्या फ्लाईट्स वेळेवर
रद्ददेखील होतात असे हॉटेलवाल्यानी पण सांगितले. सर्वदृष्टीने वेळ आणि
आर्थिक गणित यांचा विचार केल्यास बसप्रवासाचा पर्याय सर्वात सोयीचा वाटला.
रात्री उशिरा आरामात बुकिंग करायला घेतलं आणि तेवढ्यात फोन वाजला ...
Ranju mavshi calling ....
बापरे...! आता यावेळी कसा काय फोन मावशीचा? काय झाले असेल? जरा साशंकतेनेच फोन उचलला तर मावशीचा पहिला प्रश्न, "आपलं बुकिंग झालं का गं?"
"हो, हॉटेलचं झालंय, अजून बसचं बाकी आहे. का गं ? काय झालं?"
"अगं, माझी एक मैत्रीण ‘ज्योती‘ पण यायचं म्हणते आहे आपल्या बरोबर. तर अजून एक मेम्बर वाढवता येईल का?" इति रंजू मावशी
ओह, आता आली की पंचाईत! हॉटेल मध्ये ३ ऍडल्टस १ चाईल्ड अशी एकच रूम बुक
केली आहे. आता आणि एकजण वाढणार म्हणजे २ रूम्स कराव्या लागतील. शिवाय
सुट्टीचा सीजन असल्याने त्याच हॉटेलमध्ये दुसरी रूम मिळायला हवी. किंवा मग
दुसरे हॉटेल बघायला लागणार आता. आणि हे 'नमन बस्तर' वाले रिफंड किती आणि
कधी करतील काय माहित? एक ना दोन,अनेक प्रश्न मनात चमकून गेलेत. तिकडून
मावशी विचारतेच आहे कि "काय सांगू मैत्रिणीला?"
"म्हटलं थांब जरा. उद्या सकाळी हॉटेलशी बोलते आणि मग सांगते".
दुसऱ्या दिवशी सकाळी परत हॉटेलला फोन. एक मेम्बर वाढतोय म्हटल्यावर समोरून उत्तर आलं कि
"अजी मेडमजी, कोई बात नही जी।
अपने रूम बहुत बडे बडे हैं।
चार क्या, छह लोग भी रेह लेंगे आराम से।
आप बस पंधरासौ रुपैय्या एक्सट्रा भर दिजीए....| "
हो ना करत, घासाघिस करत जास्तीचे हजार रुपये ठरले आणि एक्सट्रा बेडसह बुकिंग स्टेटस अपडेटेड... आणि हा एक 'एक्सट्रा मेम्बर' सामील करून घेण्याचा या ट्रिप मधला सर्वोत्तम निर्णय ठरला.. उत्साहाचा झरा... न्हवे न्हवे.. 'उत्साहाचा धबधबा' म्हणूया अशा व्यक्तिमत्वाची ग्रुपमध्ये एन्ट्री झाली.. मिसेस ज्योती डोळस उर्फ ‘ज्योती मावशी’... उर्फ 'ज्योती आज्जी'. तिच्याच भाषेत सांगायचे तर सगळं चालतं मला, काहीही हाक मारा, कुणी ताई ,कुणी काकू,मावशी,कुणी आजी .सगळी नाती प्रेमाची
आता ३ सिनिअर सिटीझन, एक जुनियर सिटीझन आणि मी, अशी पाच जणांची यात्रा ठरली. त्याच सुमारास रेल्वे मंत्र्यांनी मध्य भारतासाठीच्या पहिल्या 'वंदेभारत एक्सप्रेसची' घोषणा केली.. अरे वा.. चला हा पण अनुभव घेऊन टाकूया ..! लगोलग परतीचे तिकीट (रायपूर- नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसचे बुक केले. बसचे जाण्यायेण्याचे तिकीट काढून झाले, व्हॉटसॅप ग्रुप तयार झाला, त्यावर सगळे अपडेट्स, सूचना, तिकिटांच्या प्रती, सगळ्यांचे आधार कार्ड्स, इमरजंसी फोन नंबर्स, घरचे संपर्क क्रमांक अशा असंख्य गोष्टींची देवाण घेवाण सुरु झाली. आणि सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.
क्रमशः
तळटीप
मी मागे एकदा इथेच मायबोलीवर म्हणाले होते कि
'भारत का दिल' म्हणजे मध्यभारत हा नैसर्गिक सौंदर्याने
नटलेला प्रदेश. ब्रिटिश अमदानीत CP & Berar प्रांत. घनदाट जंगले, पशू
संपदा, खनिजे, वनस्पती विविधता असलेल्या या प्रदेशाच्या सीमा उत्तरेस
सागर-जबलपूर पासून दक्षिणेस हैदराबाद संस्थानापर्यंत तर पश्चिमेस
बुलढाण्यापासून पुर्वेस बस्तरपर्यंत होत्या. यात आजच्या भूगोलाच्या
दृष्टीने बघितल्यास पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, बालाघाट, सातपुडा
पर्वतरांगा, दंडकारण्य आणि छत्तीसगढ असे विभाग पडतात. हा प्रदेश तलावांचा
प्रदेश म्हणून सुधा ओळखल्या जातो.
खरतरं मध्य भारताच्या एकंदरीतच समाज जीवन आणि संस्कृतीबद्दल खूप
लिहिण्यासारखं आहे. इथली घनदाट जंगले, भेडाघाट- चित्रकोट सारखे प्रचंड
धबधबे, पचमढी- चिखलदरा ही पर्यटन स्थळे, चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील प्राचीन
मंदिरे, इटियाडोह- नवेगावबांधसारखे जलाशय यांबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच.
पुढे कधीतरी या सगळ्यांवर लिहिण्याची इच्छा आहे.
तर सादर आहे मध्य भारतातल्या 'बस्तर' या नितांतसुंदर प्रदेशाची सफर. हा सध्याच्या छत्तीसगढ राज्याचा दक्षिण भाग. रामायणातील 'दक्षिण कोसल जनपद'. 'द ओरिजनल दंडकारण्य' .. नक्षलवादाचा डाग लागलेला हा प्रदेश. पण त्यामुळेच काहीसा अस्पर्श. नुसते भटकंतीचे वर्णन करण्यापेक्षा तेथे भेटलेली माणसे, बस्तरचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून द्यायची इच्छा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात काही ऐकीव दंतकथा पण येतील ज्यांच्या source बद्दल मला खरंच काही माहिती नाही. त्यामुळे मी सगळ्याच प्रश्नाची उत्तरे नाही देऊ शकणार.
मी काही लेखिका नाही. ना vlogger. त्यामुळे माझ्या मर्यादित अनुभव
विश्वाला गोड मानून घ्या. काही सूचना असतील जरूर सांगा. त्याप्रमाणे बदल
करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कुठे जास्तीचं पाल्हाळ लावलं असं वाटत असेल
तर तसंदेखील सांगा. मात्र कडू-गोड का असेना प्रतिक्रिया येऊ द्यात. म्हणजे
मला स्वपरीक्षण करता येईल.
आणि एक, हे मी आधी लिहून ठेवलेलं नाहीय. त्यामुळे ३-४ दिवसांच्या अंतराने
भाग प्रकाशित करेन. (घाबरू नका ३-४ भागांमध्येच लेखमालिका आटोपती घेईन).
--मृण्मयी
15:32

भाग १
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...
ख्रिसमस पार पडला. बॅग भरण्यावरून नेहमीप्रमाणेच असंख्य छोट्या मोठ्या
चकमकी उडाल्यात (हि एक आमच्या घराची परंपरा आहे कारण आईसाहेबांना नेहमीच
वजनाला हलक्या पण संख्येने जास्त बॅग्स घ्यायच्या असतात तर मला वजन जास्त
झाले तर चालेल पण नग जास्त होता कामा नयेत. समोर आणून घातलेल्या ढिगातून
गरजेपुरत्याच वस्तू निवडून बाकी पांघरायला घेतलेल्या चादरी,जास्तीचे
पायमोजे/हातमोजे इ. वस्तूंवर काट मारली.
(इथला संवाद :
- "हि पांघरुणे कशाला घ्यायची ?"
- "अगं असू देत, आपल्या आपल्या चादरी असलेल्या बऱ्या"
- "अगं हॉटेल बुक केलं आहे तिथे. धर्मशाळा नाही"
- "बस मध्ये लागतील"
- "स्लीपर कोचचं बुकिंग आहे आपलं. ते देतात पांघरुणे"
- "छे छे. त्यांचं नको. कधी धुतात कि नाही कोण जाणे.. "
- "शाली घेतल्या आहे ना? त्या वापरा बस मध्ये". आणि मग बरीच धुसफूस होऊन पांघरुणे कपाटात परत गेलीत)
असो. तिघीत मिळून दोन बॅग्स आणि एक खाऊची पिशवी रात्रीच भरून ठेवली. सकाळी ५
वाजताच निघायचे होते. ओला शेड्युल करून ठेवली आणि रात्री जरा लवकरच गुडूप
झालोत.
२६ तारीख उजाडली. ट्रेन स्टेटस ‘On Time’ बघून सव्वासहाची ट्रेन गाठायला पावणे सहालाच मध्य रेल्वेचे इतवारी स्टेशन गाठले आणि कानावर घोषणा.. 'प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे , गाडी क्रमांक 12856 , नागपूर- बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेच्या ५० मिनिटे उशिराने सुटेल. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबद्दल …
पहिली माशी इथेच शिंकली. ठीक आहे. आलिया भोगासी असावे सादर. १ तासच ना, बसुया स्टेशनवरच. तसे स्टेशन एकदम स्वच्छ होते त्यामुळे एक बेंच पकडून तिथे ठिय्या दिला. खाऊची पिशवी उघडल्या गेली. हळू हळू आमचे सहप्रवासी आजूबाजूला येऊन बसायला लागलेत. एक शाळेची सहल आली आणि शांत वातावरणात एकदम जिवंतपणा आल्यासारखा झाला. ७ वाजता मघाचीच घोषणा परत. पण आता ५० मिनिटांऐवजी २ तास ५० मिनिटे होती. आता वैताग यायला लागला. काही लोक इतर काही पर्याय मिळतात का ह्याची चौकशी करू लागलेत. आजूबाजूनी 'भारतीय रेल्वे'वर टीका / टिप्पणी सुरु झाली. विनोद सांगितले जाऊ लागलेत. काहींनी बसचा पर्याय निवडून रेल्वे स्टेशनवरून काढता पाय घेतला. पुन्हा एकदा तिसरी घोषणा झाली.... आपल्या निर्धारित वेळेच्या ५ तास १० मिनिटे उशिराने सुटेल..
आता मात्र आमचं धाबं दणाणलं. हे असंच चालू राहिलं तर कसं? जरी आपली जगदलपूरसाठीची बस रात्री उशिराची आहे तरी संध्याकाळच्या आत रायपूरला काहीही करून पोचायलाच हवं. बसल्या बसल्या मोबाईलवर इतर गाड्यांचे पर्याय शोधायला सुरवात केली. सगळीकडे १०० च्या पुढे WL किंवा मग सरळ REGREAT. आता कसं करायचं? yesss.. दुपारची २:३० ची वंदेभारत. AVL २०६. लगेच BOOK NOW वर क्लिक केले. इकॉनॉमी क्लासची ३ तिकिटे काढलीत. इंटरसिटीचं आरक्षण रद्द केलं. refund मिळाला तर ठीक, नाहीतर तेवढे पैसे 'भारत सरकार सेवार्थ' असं म्हणून १०:३० वाजता आमची वरात परत (खाऊच्या निम्म्या फस्त झालेल्या डब्यांसह) घरी दाखल झाली.
दुपारी १ वाजता जेवणे आटोपली. खाऊचा डब्बा नव्याने भरला. 'सुटसुटीतपणे वागवायला बरी'
म्हणून एक एक्सट्रा बॅग तेवढ्या वेळात सामानात सामील झालीच. आणि यावेळेला
ट्रेन स्टेटस तीन तीन वेळेला तपासून घेत परत एकदा आमच्या स्वाऱ्या स्टेशनात
दाखल व्हायला रिक्षात बसल्यात. स्टेशन जवळ पोहोचलोच. एक उड्डाणपूल बाकी
आहे कि आम्ही स्टेशनातच. पण.. पण.. पण..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे हे कसे काय बरे विसरलो आम्ही? झिरो
माईल चौकाजवळ रास्ता रोको आंदोलन चालू होते. रस्त्यात अनेक मोर्चे,
पोलिसांचे कठडे. मामूच मामू चहूकडे- गेली आता ट्रिप कुणीकडे??? एका
पोलिसाने रिक्षा अडवली.
"मामा, स्टेशनपर जाना है. यहांसे नजदिक पडेगा, जाने दो ना" त्याने आत डोकावून बघताच आम्ही आर्जव केलं.
"कहाँ जाना हैं? कौनसे गांव? कौनसी गाडी से?"
उलटतपासणी सुरू झाली. सगळ्या चौकशीला यथाशक्ती सामोरे गेल्यावर(च) मामांचे
समाधान झाले आणि त्याने बदली रस्ता सांगितला. १० मिनिटे इथेच गेलीत. आता
घाई करणे गरजेचे झाले होते. रिक्षावाल्या भैयांना १० वेळा "जल्दी जल्दी चलो
भैया, सौ रुपये एक्सट्रा देंगे" बोलून झाले. पण रिक्षा भयानक ट्राफिक जॅम
मध्ये फसली होती. एकदा विचार केला. जाऊदे उतरू इथेच. समोर तर आहे स्टेशन.
जाऊया चालत चालत. पण भैय्यानी त्यांचे रिक्षा चालनाचे कसब, नागपुरातल्या
गल्लीबोळांचे ज्ञान आणि तोंडाने मुक्तपणे समोर येईल त्या प्राण्याला शिव्या
घालण्याइतका (अप)शब्दसंग्रह यांच्या जोरावर आम्हाला गाडीसुटण्यापूर्वी
बरोब्बर १० मिनिटे नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकाच्या मागील दारात म्हणजे
'संत्रा मार्केट गेट' वर नेऊन सोडले आणि एक्सट्रा १०० रुपये कमावलेत.
समोर आलेल्या पहिल्या कुलीला पकडले. “वंदे भारत. बोगी XYZ सीट नंबर XYZ” इतकेच सांगितले आणि सामान अक्षरश: त्याच्या हातात कोंबले. कुली "आओ मेरे पीछे" म्हणाला आणि (जवळ जवळ) अंतर्धान पावला. आम्ही अक्षरश: धूSSSSम पळत त्याच्या मागे निघालो. त्यात माँसाहेबांना स्वयंचलित जिन्यांचा फोबिया. आता आली पंचाईत. शेवटी मी समोरून आईचा हात धरून तिला हळूच ओढले आणि विजयालक्ष्मीने "आज्जी यू कॅन डू इट" म्हणत मागून हलकासा धक्का देत आजीला सरकत्या जिन्यावरून इच्छित डब्यासमोर आणण्याचे कठीण कार्य संपन्न केले. कुली आमच्या सीटवर वाट बघत बसला होताच. त्याचे भाडे घेऊन तो उतरताच गाडीचे दरवाजे बंद झालेत. हुश्श…
'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने' या म्हणीची पुरेपूर प्रचिती या अर्ध्या दिवसात आम्ही घेतली. आणि 'सफर'नामा या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांप्रमाणे उमजला.
'वंदे भारत एक्सप्रेस' के क्या केहने... ! सगळीकडे नव्याची नवलाई झळकत
होती. स्वयंचलित दरवाजे, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि छत्तीसगढी अशा चौभाषिक
घोषणा, स्पीड डिस्प्ले बोर्डस, सीटच्या पाठीला असलेले खानपानाचे टेबल्स,
टिपटॉप गणवेशधारी कर्मचारी.
गाडीने वेग घेतला.. थोड्याच वेळात व्यवस्थित ट्रे मधून अल्पोपहार सर्व्ह
करण्यात आले. त्यानंतर आईस्क्रीम. मज्जाच मज्जा..! विजीची पलीकडल्या
सीटवरल्या अंकलशी गट्टी जमली होती. मग काय, त्यांच्या वाटणीचे आईस्क्रीम पण
तिलाच.
गोंदिया पार केले आणि गाडीने महाराष्ट्र सोडला. आता नवे राज्य.
आजूबाजूचा भूप्रदेश पण थोडाफार बदलायला लागला होता. विरळ तुरळक झाडी जाऊन
आता गच्च घनदाट झाडी दिसायला लागली. आता गाडी 'डोंगरगढ - धारा रिझर्व
फॉरेस्ट' मधून जाते.
साडेचार वाजता डोंगरगढ पार केले. 'बम्लेश्वरी' या मूळ आदिवासी देवतेचे
ठाणे असलेले 'डोंगरगढ' हे या भागातले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. घनदाट
झाडीने वेढलेल्या काळ्या खड्या कातळांवर वसलेल्या उंचावरच्या मंदिराचे
गाडीमधूनच दर्शन होत होते.
या देवीला झेंडूच्या फुलांची आरास करतात. सोबतच्या अंकलनी त्याबद्द्लचे एक मजेशीर लोकगीत 'चलो चले देखणं को फुल गेंदा' अगदी तालासुरात म्हणून दाखवले.

असा हसत खेळत प्रवास पार पडला आणि सायंकाळी ६ वाजता रायपूर आले. आमच्या जुन्या वेळापत्रकानुसार तब्बल ७ तास उशिराने रायपूरात पाय ठेवला. तेथे कळले कि सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस अजूनही पोहोचली नाहीय..
जुन्या रायपुरातील डांगानिया भागात मावशीचे घर आहे. तिने भलेमोठे स्वागत केले. रात्रीसाठी स्वयंपाक करून ठेवलाच होता. इन मिन तीन जणी जेवायला (कच्चा-लिंबू गाडीतच खाऊन-पिऊन आता सुस्तावला होता) पण जेवण एकदम साग्रसंगीत. सुपापासून तुपापर्यंत चारीठाव जेवायला होते. "अगं एवढं कशाला करत बसलीस? आता लगेच रात्रीचा बस प्रवास आहे" तर मावशी सांगू लागली, कि "माझ्याकडे पाहुणे येणार म्हटल्यावर शेजाऱ्यांनी एक- दोन पदार्थ खास बनवून आणून दिलेत. आपके मेहमान वो हमारे मेहमान" अशी पद्धत आहे. म्हणून इतके पदार्थ झालेत". थोडे थोडके अन्न पोटात आणि बरेचसे फ्रीझ मध्ये ढकलले. थोडा वेळ आराम केला .
रात्री १०:३० वाजताची 'स्लीपरकोच' बस होती. नवे बसस्थानक जरा शहराच्या बाहेर असल्याने पावणे दहा वाजताच ज्योतीमावशी तिच्या मुलासह कार घेऊन हजर झाली व आम्ही ते भले मोठे बसस्थानक गाठले.
आजच्या दिवशीचा suffer नामा अजून संपला न्हवता हेच खरे. बस स्थानकात
गेल्यावर कळले कि रायपूर पासून १० किमी अंतरावर कुठेतरी दोन ट्रक
ड्रायव्हर्स मध्ये भांडण होऊन मारामाऱ्या झाल्यात आणि त्यांनी आता चक्का
जाम सुरु केलाय. सगळ्या बसेस तेथे अडकल्या आहेत. 'जय हरी विठ्ठल. बसा आता
इथेच भजन करत'. विजयालक्ष्मीला दिवसभराच्या दमणूकीने झोप अनावर झाली होती.
मग तेथेच कारमध्ये तिला झोपवले.
अर्ध्या तासानंतर एक बस दुरून येताना दिसली. मग थोड्या थोड्या अंतराने एक
एक बस येऊ लागली. "चला, विठ्ठल पावला म्हणायचं." आणि मग १०:३० च्या बस
मध्ये पावणे बाराला झोपलेल्या बाळासह स्थानापन्न होऊन आम्ही जगदलापूरच्या
दिशेने कूच केले.
क्रमशः
बस एकदम नवी, स्वच्छ आणि अतिशय आरामदायक होती.
जगदलपूर हे शहर रायपूरच्या दक्षिणेकडे असून रस्त्याने हे अंतर २९० किलोमीटर
आहे. वाटेत लागणारी मोठी गावे म्हणजे कुरुंद, धमतरी, चारामा, कांकेर,
केशकाल आणि कोंडागांव. कांकेर पार केल्यावर रात्री अडीच वाजता गाडी एक
धाब्यावर थांबली. कोणाला चहा हवा असेल किंवा वॉशरूम वापरायची असेल तर इथेच
जावे लागेल. इथून पुढे आपण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. यानंतर
गाडी आता थेट जगदलपूर शहरातच थांबेल अशी चालकाने सूचना दिली आणि २०
मिनिटांची विश्रांती जाहीर केली.
इथून पुढे आपण दंडकारण्यात प्रवेश करतो. या घाटाचं नाव आहे 'केशकाल
घाटी' ज्याला दंडकारण्याचे प्रवेशद्वार म्हणतात. शतकानुशतके या पहाडांमुळे
बस्तर प्रदेश अस्पर्श राहिला होता. इथल्या दुर्गम भूभागाने बस्तरच्या नाग
चालुक्य राज्यावरील अनेक हल्ले परतून लावले.
‘केशकाल’ या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे. इथली रस्त्याची अरुंद आणि
अतिशय तीव्र उताराची अशी बारा वळणे आणि खोल दऱ्या नेहमीच वाहनांसाठी काळ
ठरले आहेत. काळाच्या उदरात सामावण्यासाठी फक्त केसभर अंतराचा फरक महत्वाचा
आहे म्हणून हा 'केशकाल' घाट. याचेच नाव 'बारा भंवर घाट' उर्फ 'तेलिन घाटी'.
.
(Image: google earth)
घाटात 'तेलीण' मातेचे मंदिर आहे. तेथे सलामी देऊनच पुढील प्रवासाची सुरवात झाली. रस्ता दिसत जरी नसला तरी घाटाचे प्रत्येक वळण जाणवत होते. रात्रीच्या अंधारामुळे बाहेरची हिरवाई जरी दिसत नसली तरी या घुप्प अंधारात या गच्च जंगलाचा एक वेगळाच गंध आसमंतात जाणवत होता.
सकाळी ६ वाजता बस व्यवस्थित जगदलपूर बस स्टँडला पोचली. येथून हॉटेलवर
जायला इ - रिक्षा आणि मोठ्या सहा आसनी रिक्षांची सोय आहे. मात्र ओला /उबेर
कॅब सर्व्हिस जगदलापुरात दिसली नाही. इतक्या सकाळी पण बस स्टॅण्डवर बरेच
रिक्षेवाले दिसत होते. त्यातलाच एकाला पकडलं.
"भैया नमन बस्तर जाना है"
हां मैडमजी, छोड देंगे, बैठिये आप आटो में" असं सांगितल्यावर रिक्षात सामान
चढवून आम्ही सगळ्याजणी स्थानापन्न झालो पण महाराज काही निघायचं नाव घेईना.
आम्हाला वाटले आणखी सवारींसाठी थांबला आहे कि काय? "क्या हुआ भैय्या, चलते
क्यू नहीं? "जी सब लोग आ गये क्या?" त्याचा प्रश्न. "हां भैय्या, सब बैठ
गये हैं आप चलिये" असं म्हणताच तो हैराण होऊन आमच्याकडे बघत, 'खाली
लेडीज्य' असं पुटपुटत चालकाच्या जागी स्थानापन्न झाला. हा असा अनुभव पुढे
दोन - तीन वेळेला आला. फक्त बायका बायकाच हिंडताहेत असं पाहून अनेक लोक
आश्चर्यचकित व्हायचे. काही ठिकाणी 'चार अकेली लेडीज' म्हणून छोट्या मोठ्या
सवलती देखील मिळाल्या.
आता हळू हळू उजाडू लागले होते. आजूबाजूचा परिसर उजळायला लागला होता.
सर्वप्रथम काही जाणवले तर कमालीची हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच
उंच झाडे आणि अतिशय शुद्ध हवा.
१५ मिनिटांत 'हॉटेल नमन बस्तर' आले. रिसेप्शनच्या दाराशी आम्हाला सोडून रिक्षावाला परत गेला.

चहूकडे एकदम सामसूम. रिसेप्शनमध्ये पण कोणीच नाही. दारावरची घंटा दोनदा -
तीनदा वाजवल्यावर एका अर्धवट झोपेत असलेल्या माणसाने दार उघडले. त्याला
बुकिंग डिटेल्स दिलेत. डायमंड डबल रूमचे बुकिंग असून देखील आमच्यासाठी
'प्लॅटिनम स्वीट' राखून ठेवण्यात आला असल्याचे शुभवर्तमान समजले. झालं असं
होतं कि आदल्या दिवशी जे त्या खोलीत राहत होते त्यांनी मुक्काम वाढवल्याने
मधल्यामध्ये आम्हाला हि बढती मिळाली होती (आणि ती पण चकटफू). आनंदाने
किल्ल्या ताब्यात घेतल्या.
हे हॉटेल म्हणजे साडेतीन एकर शेतजमिनीवर वसविलेले मस्त रिसॉर्ट आहे.
मुख्य प्रवेशदारापासूनच दोन्ही बाजूला उंच उंच झाडे असलेला हिरवागार रस्ता
पुढे स्वागतकक्षापर्यंत जातो.
स्वागतकक्षासमोरच एका भल्या मोठ्या झाडाखाली एक सिमेंटची छोटीशी टुमदार छत्री बांधली आहे आणि तिथे आपला गणपतीबाप्पा मांडला आहे.
रोज सकाळी या गणूबाप्पाची छोटीशी पूजा होते. तसेच इथला प्रत्येक कर्मचारी
ड्युटीवर हजर झाल्यावर आधी या बाप्पाला भेट दिल्या शिवाय राहत नाही.
बाप्पा समोरून एक लांबच लांब पायवाट आत एका टेराकोटाच्या शिल्पाकडे जाते. हे एक बस्तरचे प्रतीकात्मक चिन्ह आहे.
या इस्टेटीमधून एक नैसर्गिक ओढा पण वाहतो. त्यावरला पिटुकला कमानदार पूल परिसराच्या सौन्दर्यात भर घालतो.
पुढे राहण्याचे कॉटेजेस आहेत. प्रत्येक इमारतीसमोर अतिशय सुंदर बाग राखलेली आहे.
एकीकडे भोजनगृह तर मधोमध सुंदर निगा राखलेले विस्तीर्ण लॉन, त्यावर उंच झाडाला टांगलेला झोका व लहान मुलांसाठी छोटेसे पार्क आहे.
.
.
आमचा छोटीशी बाल्कनी असलेला स्वीट पण भारी होता.
सकाळी ८ वाजताच फ्रेश होऊन हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन थोडाफार नाश्ता केला व दिवसभराच्या भटकंतीच्या नियोजनसाठी आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल मॅनेजरची भेट घेतली. इथे सरकारी वाहनाने शक्यतो कोणी प्रवास करत नसल्याने सरकारी वाहतूक व्यवस्था विशेष अशी नाहीय. शिवाय प्रत्येक ठिकाणी जायला वाहनांची वारंवारता देखील कमी आहे. त्यामुळे हॉटेलची गाडी वापरण्याशिवाय पर्याय न्हवता. बरं हॉटेलच्या गाडीचे आधीपासून बुकिंग करून ठेवायला त्याने साफ मनाई केलेली होती.
इथे मात्र मनमर्जीचे दर सांगण्यात आले. आम्हाला सांगितले गेले कि
“आता एकाच इनोवा गाडी दिवसभरासाठी उपलब्ध आहे. १० वाजता हॉटेल मधनं निघून
कांगेर अभयारण्य आणि तिरथगड धबधबा दाखवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत घेऊन
येऊ. तसें तर माणशी ३००० रुपये घेतो पण तुम्ही एकूण दिवसभरासाठी ११०००
रुपये भरा.”
मी घासाघीस करायला लागले पण मॅनेजर मात्र अडून बसला होता. आता मात्र थोडा लबाडीचा वास यायला लागला.
"आधे घंटे में फायनल बताईये मॅडम".
समोरून अल्टिमेटम आला.
म्हटलं ठीक आहे सांगते आणि बाहेर आले. आता पुढे काय करावं ह्याबद्दल आपापसात चर्चा चालू असतानाच हॉटेलचाच एक कर्मचारी हळूच म्हणाला
"मेरे दोस्त कि गाडी है अव्हेलेबल, खुद्द ड्रायविंग करता हैं, आपको घुमा लायेगा पुरा दिन. आप कहते हो तो बात करूं क्या?"
म्हटलं दे बाबा नंबर. त्याच्या मित्राबरोबर बोलले. दिवसभराचे ४५०० रुपये
ठरले. २० मिनिटांत पिकअपला येतो म्हणाला. आम्ही तयार होतोच. पाणी आणि भरपूर
खाऊ सोबत घेतला. ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर
गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड
म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
क्रमशः
भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ४- कांगेर राष्ट्रीय उद्यान

भाग ३ नमन बस्तर
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत.
चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पुढे....
पहिला थांबा कांगेर अभयारण्य. जगदलपूर पासून दक्षिणेकडे ३५ किमी अंतरावर
कांगेर अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण रस्ताच घनदाट वनामधून जातो.
किरणकुमार बरेच बोलके निघालेत. बस्तरच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे
मनापासून प्रेम आणि सार्थ अभिमान वागण्या बोलण्यात दिसून येत होता. 'रामजी'
चे निस्सीम भक्त. "सीतामैय्या हमारी मैया, और लछमन हमारे बडे भैय्या. पार लगा दे सबकी नैय्या".अशी
ठाम श्रद्धा. स्थानिक संस्कृतीबद्दल बरीच माहिती होती त्यांना. अर्ध्या
तासात कांगेर घाटी नॅशनल पार्क च्या प्रवेशद्वारासमोर गाडी उभी केली.
इथे पूर्वी खाजगी गाडयांना आत जाऊ देत मात्र गेल्या काही वर्षांपासून
वनविभागाच्या जिप्सी सफारींनाच प्रवेश आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे
सफारीसाठी शुल्क भरले. जिप्सीचा नंबर यायला वेळ लागला तोवर किरणजी माहिती
सांगू लागलेत.
सुमारे २०० वर्ग किमी क्षेत्रात पसरलेल्या कांगेर खोऱ्याचे नाव कांगेर
नदीवरून पडले आहे जी छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवरून वाहते. या अरण्यात
अनेक उंच पहाड, खोल दऱ्या, महाकाय वृक्ष आणि विविध वन्यफुले आणि वन्यजीव
आढळतात. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील येथे उगवतात. बस्तर मैना हा
छत्तीसगढचा राज्यपक्षी जो हुबेहूब माणसासारखा आवाज काढू शकतो तो पण येथेच
आढळतो.
image source: internet
संपूर्ण बस्तर मध्ये अनेक छोटे मोठे धबधबे आहेत त्यांपैकी १० प्रमुख धबधबे कांगेर अभयारण्यात आहेत.
२ तासांच्या प्रतीक्षेनंतर जिप्सी आली. जंगल सफारी सुरु झाली. अगदी घनदाट
असे जंगल. ज्याला ‘अरण्य’ हाच योग्य शब्द आहे. काही ठिकाणी झाडे आणि
वेलींची तर इतकी दाटी आहे कि खरंच सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही.
.
आत जाण्याची वाट गर्द जंगलातून होती. वर निरभ्र निळेभोर आकाश, वाटेत कुठे
एखाद्या झाडाखाली जंगली बोरांचा सडा पडलेला तर कुठे उंच उंच तपकिरी मातीची
वारुळे उभी होती. मुंग्यांच्या वारुळांना ‘बांबी असे नाव आहे तर उधईच्या
(वाळवी) वारुळांना इकडे 'वल्मिक' म्हणतात. या वल्मिकची एक गम्मत सांगितली
गाईडने. कि हि उधईची वारुळे म्हणजे जंगलातले होकायंत्र. याची पूर्वेकडील
बाजू नेहमीच सपाट गुळगुळीत असते तर पश्चिम टोकदार. या वारुळांमध्ये
पावसाळ्याच्या सुरवातीला 'फुटू भाजी' उगवते. मश्रुमचा एक प्रकार असलेली हि
भाजी स्थानिक आदिवासी गोळा करून आणतात व ती रायपूर आणि भुवनेश्वरच्या
बाजारात १५०० ते २००० रुपये किलो भावाने विकली जाते.
आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनेक छटा, नुसत्या बघण्यापेक्षा
अनुभवण्यासारखा. जंगलातली निरव शांतता व मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा
चिवचिवाट, वातावरणात भरून राहिलेला एक विशिष्ट गंध कितीतरी वेळा दीर्घ
श्वास घेऊन छातीत भरून घेतला. ऐन डिसेंबरमधले कोवळे उबदार ऊन आणि
जिप्सीच्या वेगामुळे सपासप कापली जाणारी थंडगार हवा. ती दहा पंधरा मिनिटे
सगळे शांत बसून अनुभवत होते. जरा वेळाने दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ
लागला.
आम्ही आता कांगेर नदी जवळ पोचलो होतो. हि नदी बारमाही वाहणारी आहे. जंगलात
बऱ्याच आतमध्ये एका मोकळ्या जागी जिप्सी थांबवली. पुढे काही नैसर्गिक
पायऱ्या उतरून थोडे समोर जावे लागते. नदीच्या प्रवाहात 'धारा' नावाचा एक
सुंदर छोटासा तीन पायऱ्यांचा धबधबा आहे. त्याला 'कांगेर-धारा' पण म्हणतात.
,
हिरव्यागार परिसरात काळे खडक आणि मधून वाहणारी दुधासारखी शुभ्र धारा आणि
ह्या शांततेत ऐकू येणारा फक्त आणि फक्त पाण्याचा खळखळाट. इथले पाणी उथळ आणि
सुरक्षित आहे.
नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण काळे खडक खाली उतरत जातात. तिथे कातळांवर
बकरीची छोटी छोटी पिल्ले उड्या मारत बागडत होती. या वातावरणात ते दृश्य
फार लोभसवाणे वाटत होते. तेथून पाय काही निघेना.
.
थोडे दूर भैसा दरहा नावाचे तळे आहे. दरहा/ दरा म्हणजे नदीने वळण घेताना
तयार केलेला पाण्याचा तलाव. येथे मगरींचे नैसर्गिक निवासस्थान आहे तसेच
कांगेर नदीला मिळणाऱ्या उपनद्या व हंगामी नाल्यांमुळे या खोऱ्यात काही
भागात 'झोडी' (दलदलीसदृश्य जमीन) निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पर्यटकांना
प्रवेश नाही.
छोटा पर्यटक
हे राष्ट्रीय उद्यान तीन विलक्षण लेण्यांचे घर आहे. कुटुंबसर, कैलास आणि
दंडक. स्टॅलेग्माइट्स आणि स्टॅलेक्टाइट्सच्या रचनांसाठी आणि भूमिगत
चुनखडीच्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
यांपैकी कोटमसर गुहा बघायला निघालो. ही गुहा मूळात गोपनसर गुहा (गोपन =
लपलेली) म्हणून ओळखली जात होती परंतु 'कोटसर' गावाजवळ असलेल्या या गुहेला
कोटमसर (कुटुमसर) असे नाव पडले.
Hidden entry
गुहेचे प्रवेशद्वार
या गुहेची लांबी ३३० मीटर असून सुमारे ५५ मीटर खोलवर पसरली आहे आहे.
गुहेचे प्रवेशद्वार अतिशय अरुंद असून १२ फूट खाली गेल्यावर एकावेळी दीडशे
माणसे राहू शकतील एवढ्या विस्तीर्ण कक्षात आपण प्रवेश करतो. असे ५ मोठे
कक्ष आतापर्यंत सापडले आहेत. एक लांबच लांब
मार्गिका पूढे अंतर्भागात घेऊन जाते.
गुहेत १० वर्षांखालील मुले तसेच ६० पेक्षा जास्त वय असलेल्या किंवा
श्वसनविकार असलेल्या पर्यटकांना प्रवेश नाही. त्यामुळे आमच्यापैकी फक्त
मलाच गुहेत प्रवेश करता आला. आतील हवा ओलसर दमट होती व वातावरणात एक
वेगळाच शेवाळलेला कुंद वास दरवळत होता. गुहेत जागोजागी मार्गदर्शक खुणा
केल्या आहेत व ठराविक वाट सोडून इतस्त: फिरण्यास सक्त बंदी आहे.
.
आतमध्ये चुनखडीपासून निर्मित लवणस्तंभ आहेत. या लवणस्तंभांमुळे आतमध्ये
विविध आकृत्या तयार झाल्या सारख्या दिसतात. गुहेच्या आतमधून पाण्याचा
प्रवाह वाहतो व या गुहेच्या आतील पाण्यात शंकरी नावाचे रंगीबेरंगी आंधळे
मासे आढळतात.
पुढे खोल अंतर्भागात एक प्राचीन शिवलिंग असून स्थानिक आदिवासींच्या
श्रद्धेनुसार श्रीराम वनवासात असताना या भागात वास्तव्य करून होते व
गुहेतल्या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष रामाने केली आहे.
असं म्हणतात कि या गुहेतून जाणारे गुप्त भुयार थेट जगन्नाथपुरीजवळ उघडते.
अलीकडेच २०११ साली या गुहेत आणखी एक कक्ष सापडला आहे. पावसाळ्यात मात्र
गुहेच्या आतील प्रवाह रौद्ररूप धारण करतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर
सुरक्षेच्या कारणासाठी गुहा बंद ठेवतात.
आतमध्ये बरीच माणसे होती व टॉर्चच्या प्रकाशात गाईड माहिती देत होता. पण
गर्दीमुळे जास्त निरीक्षण करता आले नाही. शिवाय मी आत गुहेत गेल्यामुळे
बाहेर लेकीने घाबरून पोंगा पसरला होता. आतमध्ये मोबाइल हि लागेना. शेवटी
तिथल्याच एका माणसाकरवी निरोप पाठवून मला बाहेर बोलावून घेतले. लेक हमसून
हमसून रडत होती. तिला जवळ घेऊन शांत केले. आणि जिप्सीत बसून पुढे निघालो.
क्रमशः
(तळटीप : मागे म्हटल्याप्रमाणे लेखमाला ३-४ भागांत आटोपती घेण्याचा प्रयत्न होता. पण आता इतक्या भराभर लिहिता येत नाहीय. त्यामुळे कदाचित २-३ भाग आणखी वाढू शकतात. )
तीरथगढ जलप्रपात

सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात
जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे
निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.
राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून वायव्येकडे पुढे १५ किमी
अंतरावर ‘तीरथगढ’ धबधबा आहे. वीस मिनिटांचा रस्ता. रस्त्यातच एका ठिकाणी
‘व्हू पॉईंट’ आला. तिथून लांबूनच या जलप्रपाताचे दर्शन होते. पुढे गेल्यावर
एक छोटासा फलक दिसला – ‘तीरथगड जलपात कि ओर’. हा धबधब्याकडे जाण्याचा
ट्रेकिंगचा मार्ग. एक छोटी वाट जंगलात गेली आहे. पण गाडीमार्ग थोडा लांबचा
फेरा घेऊन जातो. दुपारचे दीड वाजून गेले होते. पार्किंगला गाडी लावली.
परिसरात छोटी छोटी दुकाने, ढाबासदृश खानावळी, माळबांगड्यांची दुकाने,
प्लास्टिकची खेळणी विकणारे विक्रेते, काय विचारू नका. गावाकडच्या जत्रेत
आल्यासारखे वाटले. इथे खाण्या पिण्याची रेलचेल आहे. मात्र आधुनिक तऱ्हेचे
पदार्थ मिळत नाहीत. कडकडून भूक लागली होती. किरणजींना म्हटले "आधी पेटपूजा
करू, बाकी सगळं नंतर". किरणभैय्या एका ढाब्याकडे घेऊन गेले. गल्ल्यावरच्या
माणसाबरोबर नमस्कार चमत्कार झाले. ४ व्हेज थाळींची ऑर्डर दिली. म्हटलं "
किरणजी, तुम्ही पण बसा आमच्या बरोबरच". तर म्हणाले "आप शुरु किजीये, हम
बादमे आते हैं". ठीक आहे. कदाचित त्यांना संकोच वाटत असावा. निवांत बसून
आजूबाजूचे निरीक्षण सुरु केले.
झाडाची मोठाली पाने, टिनाचे पत्रे आणि बांबूचे खांब वापरून मांडव घातला
होता. त्यालाच ढाबा म्हणायचं. धाब्याच्या दारातच एका बाजूला भली मोठी चूल
पेटवली होती. त्यावर भाताचे मोठे पातेले चढवलेले दिसत होते. दुसऱ्या चुलीवर
फ्लॉवर - बटाटा भाजी रटरटत होती.
मागील बाजूला भाज्यांचे वाफे केले होते. मिरच्या, पालक, टोमॅटो, कोथिंबीर
लावलेली दिसत होती. एक मोठा प्लास्टिकचा ड्रम भरून पाणी आणि लोटा ठेवला
होता, तिथेच हात धुवायचे.
बांबूच्या फळ्यांचा टेबल आणि बसायला बांबुचेच बाकडे. मनात विचार आला कि आपण
जणू टाईम ट्रॅव्हल करून काही वर्षे मागे गेलो असून हा कोणतातरी दुसराच काळ
आहे. दहा मिनिटांतच कागदी पत्रावळींवर गरम गरम भात-भाजी आणि लिंबू
मिरचीचे लोणचे समोर आले. साधे तरी अतिशय चवदार अन्न. किरणभैय्या भाजलेले
पापड घेऊन समोर आलेत. इतर कोणाच्या ताटात तर पापड दिसत न्हवते मग आपल्यालाच
खास पाहुणचार का बुआ? तर भैय्या म्हणतात
"हमारे चाचाजी का होटल है ये, और आजके मेहमान आप हो जी"
ओह! तरीच उलगडा झाला कि आल्या आल्या किरणभैय्या बाह्या सरसावून मदतीला का गेले होते ते.
तृप्त मनाने उठलो, हात धुतले. चार थाळ्यांचे वट्ट २८० रुपये बिल झाले होते.
भैय्या म्हणाले कि तुम्ही आता आपले आपले फिरून या. तिरथगढ धबधब्याच्या
पायथ्याशी जायला इथून सरळ खाली ३०० पायऱ्या आहेत. मात्र ३ वाजेपर्यंत परत
या.
भरल्या पोटी निघालो. काही मीटर अंतर चालल्यावर उतरण सुरु होते. काही ठिकाणी
व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत, कुठे नुसताच मातीचा उतार आहे तर कुठे
पायऱ्या आहेत पण भग्नावस्थेत. इथे जंगली माकडांचा भयंकर त्रास होतो.
त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ शक्यतो नेऊच नये किंवा नेल्यास पिशवीच्या
आत ठेवावेत. आमच्या समोरच एका कुटुंबाला माकडांच्या टोळीने दरोडा घालून
लुटलेले बघितले. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आम्ही
जवळची केळी व बिस्किटांचे पुडे तातडीने लपवले.
पन्नासेक पायऱ्या उतरल्यावर ज्योती मावशीला चांगलाच दम लागला. तिला खरंतर
सायटिकाचा त्रास आहे, पाय पण ठणकायला लागले. पण तरी उत्साह इतका प्रचंड कि
हळूहळू का होईना सर्वांच्या मागोमाग ती उतरत होतीच. हि वळणांची वाट असून
घाट उतरल्याप्रमाणे पुढे जावे लागते. प्रत्येक वळणावर जरा मोकळी जागा व
काही ठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय केली आहे. पाऊण अंतर उतरल्यावर मात्र
मावशी मंडळींनी थांबायचे ठरवले. कारण खाली उतरून तर जाऊ, पण वर चढताना
मात्र पुन्हा दमछाक होईल. तिथल्याच एका बाकावर बसल्या. समोर धबधब्याचे
दर्शन होत होतेच.
थोडेच अंतर खाली जायचे राहिले होते. आईला म्हटलं "मी आणि विजी पटकन जाऊन
येतो तू वाटलं तर थांब मावश्यांसोबत". असं म्हणून आम्ही पुढे निघालो.
२५-३० पायऱ्या उतरून धबधब्याच्या अगदी पायथ्याशी पोचलो. आता समोर जाणारच
तेवढ्यात पाठून आईची दमदार हाक.
"थांबा गं. खूप पुढे जाऊ नका."
वळून बघितल तर माँसाहेब आमच्या पाठोपाठ हजर. दोघीच गेल्या तर नक्कीच
पाण्यात उतरतील ह्याची तिला खात्री होती. माँसाहेबांना आमच्यावर भरोसा नाय.
तीरथगड हा छत्तीसगडचा सर्वात उंच (कि खोल?) धबधबा. हा बारमाही प्रपात
कांगेर नदीच्या दोन उपनद्या मूंगा आणि बहार यांनी मिळून बनला आहे. एकच सलग
धार नसून ३ वेगवेगळ्या पातळ्यांवरून हा खाली झेप घेतो. ज्याला कंपाऊंड फॉल
म्हणतात.
लोक खडकांवर चढून धारांखाली भिजत दंगा करत होते.
उंच कड्यावरून खाली आलेल्या धारा जरा डावीकडे वळण घेतात आणि मधल्या पातळीचा धबधबा निर्माण करतात.
या धारा ओलांडायला एक छोटासा कमानदार पूल बांधला आहे ज्यावरून पलीकडे असलेल्या जुन्या मंदिरसमूहापर्यंत जाता येते.
लोककथेनुसार ११ व्या शतकात तिर्थराज आणि चिंगराज नावाचे दोन भाऊ होते.
इथल्या निसर्गसौंदर्याने मोहित होऊन त्यांनी बस्तर प्रदेशाचा या भागात आपली
राजधानी वसवली. तीरथराजांनी धबधब्याच्या खालच्या बाजूला आपला गड बनवला आणि
वरच्या प्रदेशात तीरथगड गाव वसवले जिथे अजूनही वस्ती आहे. चिंगराजने
तीरथगडपासून ७ किमी अंतरावर चिंगीथराई नावाचे गाव वसवले आणि एक भव्य मंदिर
बांधले. त्याचे मात्र आता अवशेष उरले आहेत.
.
तिसऱ्या पातळीवर एक खोलगट कुंड तयार झाले आहे. हे पवित्र कुंड मानले जाते.
या कुंडात आसपासचे आदिवासी आपल्या प्रियजनांच्या रक्षेचे विसर्जन करतात.
महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. येथून पुढे मूंगा आणि बहार या दोन
नद्या 'मुंगाबहार' या नावाने कांगेर नदीला भेटायला प्रस्थान करतात.
.
.
विजयालक्ष्मीला पाण्यात भिजायचे होते मात्र इतका वेळ न्हवता. कारण जर का ती
एकदा धारांखाली गेली तर कमीत कमी तासाभराची निश्चिती झाली असती. मग फक्त
पाय बुडवण्यासाठी १ मोठ्या कॅडबरीची मांडवली झाली. थोडा वेळ तिथे घालवून वर
जायला निघालो.
मावशीला मघाशीच फोन करून परत निघायला सांगितले होते त्यानुसार दोघी आधीच
चढाई करत होत्या. त्या दोघींना वाटेत माथ्याजवळ गाठले. मासाहेबांच्या
स्टॅमिनाची मात्र दाद द्यायला हवी. परतीच्या वाटेवर जरा माळबांगड्यांच्या
दुकानापाशी थबकलो. सहज गंमत म्हणून काही कानातले, अंगठ्या घेतल्या. इनमीन
३०० रुपयांची खरेदी पण विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून
गेले.
फिरून पुन्हा चाचाजींच्या ढाब्याजवळ आलो. किरणभैय्या गरमागरम भज्यांची
प्लेट घेऊन समोर आले. सोबत हिरवी चटणी आणि गारगार फ्रुटी. काय म्हणावं या
पाहुणचाराला?
बरोबर सव्वातीन वाजता पुढे प्रस्थान केले. आजूबाजूचा निसर्ग आता बदलत
होता. घनदाट जंगल जाऊन उंच सखल पठारासारख्या भागातून रस्ता जात होता. झाडे
पण बरीच विरळ दिसत होती.
हा खरा संवेनदशील भाग. दर १० किमी अंतरावर CRPF चे कॅम्प्स दिसत होते.
बाईक्सवर रायफलधारी जवान पेट्रोलिंग करताना दिसू लागले. हीच ती कुप्रसिद्ध
'झीरम घाटी'. इथेच १० वर्षांपूर्वी घडलेली घटना अजूनही अंगावर शहारे आणते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीची सुकमा येथील प्रचारसभा आटपून छत्तीसगड
काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नंदकुमार पटेल इतर बऱ्याच बड्या काँग्रेस नेत्यांसह
जगदलपूरला परतत होते. सोबत मोठे सुरक्षा पथक देखील होते. दुपारी चारच्या
सुमारास हा ताफा झीरम खोऱ्यातून जात होता. येथे नक्षलवाद्यांनी झाडे तोडून,
ओंडके टाकून रस्ता अडवला. वाहने थांबली आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच
झाडांच्या मागे लपलेल्या 200 हून अधिक नक्षलवाद्यांनी धडाक्याने गोळीबार
सुरू केला. सर्व वाहनांना लक्ष्य केले. यात नंदकुमार पटेल आणि त्यांचा
मुलगा दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दीड तास गोळीबार सुरू होता.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षलवादी डोंगरावरून खाली आले आणि प्रत्येक
वाहनाची तपासणी करू लागले. क्रॉसफायरमध्ये मारल्या गेलेल्यांना पुन्हा
गोळ्या घालण्यात आल्या. चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात 30 पेक्षा
अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अजित जोगी वगळता छत्तीसगड काँग्रेसचे
त्यावेळचे बहुतांश बडे नेते आणि सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. 

वळणदार सुंदर रस्ता. बाजूला तपकिरी माती, हिरवीगार भात खाचरे आणि त्यात काम
करणारे शेतकरी बायका-पुरुष दिसत होते. गाई बकऱ्या चरताना दिसत होत्या.
नाल्यांत म्हशी डुंबत होत्या. एकामागे एक गावे झपाट्याने मागे जात होती.
गाव आले कि रस्त्यात शाळकरी मुले दिसायची. घरांसमोर खाटेवर म्हातारे पुरुष
निवांत ऊन खात बसलेले असत, अंगणात कोंबड्या दाणे टिपताना दिसायच्या तर
बायका दारात बसून काहीबाही निवडण- टिपण करताना दिसत होत्या. एकंदरीत
समाधानी चित्र दिसत होतं. पिक्चर परफेक्ट .
चेकपोस्ट आले. दोघा जवानांनी गाडी अडवून चौकशी केली. सर्वांची ओळखपत्रे आणि
वाहन परवाना व इतर कागदपत्रे तपासली आणि गंमतीने म्हणाले "दिदी, इतना
गेहरा ‘लाल रंग’ पेहन कर नही घूम सकते आप यहाँ" आणि हसण्याचा गडगडाट करत
पुढे जायला परवानगी दिली.
क्रमशः
(यापुढे फोटो कसे टाकावे असा प्रश्न पडला आहे. माझी खाजगी जागा संपली
)
भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ६ : सा रम्या नगरी...

इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.
येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.
त्यातील प्रमुख एक म्हणजे ११व्या शतकातील चंद्रादित्य मंदिर. या
मंदिराला लागून चंद्रादित्याने चंद्रसरोवर देखील खोदले होते, ज्याला आजकाल
बुध सरोवर किंवा बुढा तालाब म्हणतात. बुध तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर
बस्तरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत अजूनही उभे आहे. मंदिराच्या
मागच्या विस्तृत ३० एकर जागेवर राजा बारसूरची/ बाणासुराची गढी होती.
चंद्रादित्य नावाच्या सामंताने ह्या मंदिराची निर्मिती केली. तर कोणी
म्हणतात कि चंद्र आणि आदित्य नावांवरून त्याचे नाव चंद्रादित्य पडले आहे.
यात शिव, विष्णू आणि महिषासुरमर्दिनीची भंगलेली प्रतिमा आहे.
.
थोड्याच अंतरावर दुसरे शिवमंदिर आहे. कळस नसलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य
म्हणजे ३२ खांबांचा दगडी मंडप, ज्यात चार ८ असे एकूण ओळींमध्ये 32 खांब
आहेत. हे बत्तीशा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
चौकोनी पायावर बांधलेल्या ह्या मंदिराला दोन समान गर्भगृहे आहेत आणि समोर दोघांत मिळून एक विशाल नंदी विराजमान आहे.
जुन्या दंतकथेनुसार या बत्तीस मंदिरातील कोण्या एका खांबामधून एक गुप्त
द्वार आहे. या मंदिरातील दोन्ही गाभाऱ्यांमधील शिवलिंग केवळ एका बोटाने
गोलगोल फिरवता येते. लोकमान्यतेनुसार हि एक किल्ली असून जर दोन्ही शिवलिंग
योग्य त्या पद्धतीने फिरवले तर इथला गुप्त दरवाजा उघडतो. पण काळाबरोबर तो
दरवाजा हि आता लुप्त झाला आहे आणि तो पासवर्ड जाणणारा पण कोणी उरला नाही.
फिरते शिवलिन्ग
नंतर आहे इथलं प्रसिद्ध मामा - भांजा मंदिर. इतर मंदिरांच्या तुलनेनं
जरा बऱ्या अवस्थेत आहे. या नावामागे पण एक आख्यायिका अशी कि हे मंदिर केवळ
एका दिवसात दोन कारागिरांनी जे नात्याने मामा-भाचा होते बांधून पूर्ण केले
होते. मंदिराच्या कळसावर उंचावर मामा-भाच्याचे कोरीव शिल्प देखील आहे.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार बारसूरमध्ये ज्या गंगावंशी राजाचे साम्राज्य होते.
त्या राजाचा भाचा कलाप्रेमी होता. आपल्या मामा (राजा)ला न कळवता भाच्याने
उत्कल देशातून कारागिरांना बोलावून भव्य मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
आपल्या नकळत भाच्याने मंदिरनिर्माण सुरु केले हे बघून राजाचा अहं दुखावला व
त्याने भाच्याला युद्धासाठी ललकारले. या युद्धात भाच्याच्या तलवारीने
मामाचा मृत्यू ओढावला. पश्चतापदग्ध भाच्याने मग राजा बनल्यावर या मंदिरावर
मामाच्या शिराची हुबेहूब प्रतिकृती बसवली. मग भाच्याच्या मृत्यूनंतर
त्याच्याही चेहऱ्याची प्रतिमा इथे स्थापन करण्यात आली. या दोन मूर्तींमुळे
याला 'मामा-भांजा' मंदिर म्हणतात.
मंदिरावर चहूकडे अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले दिसते.

पौराणिक कथेनुसार हे मंदिर राजा बाणासुराने बांधले होते. बाणासुराची मुलगी उषा आणि त्याच्या मंत्र्याची मुलगी चित्रलेखा यांची घट्ट मैत्री होती. या दोघींसाठी म्हणून बाणासुराने युगल गणेशाच्या प्रतिमा येथे स्थापन केल्या. हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले होते. केवळ गणेशप्रतिमा शिल्लक राहिल्या होत्या. मात्र आता या मूर्तींभोवती जुन्याच पायावर नव्याने सिमेंटचे लहानसे देऊळ उभारले आहे.

संकुल परिसरात सर्वत्र दगडांचे अवशेष विखुरलेले आढळतात.

येथील चार मंदिरांची पुरातत्व विभाग पुनर्बांधणी करत आहे.
परंतु इथल्या परिस्थितीमुळे कामाला म्हणावा तसा वेग प्राप्त होऊ शकत नाही.अनेक मूर्ती, शिवलिंग आणि कोरीव भग्न दगड मोकळ्या आकाशाखाली उघड्यावरच पडलेल्या आहेत.

बुध तलावाच्या पलीकडील बाजूस असलेल्या एका दगड मातीच्या उध्वस्त ढिगाऱ्यात सात घोड्यांच्या रथावर आरूढ असलेली सूर्यप्रतिमा मिळाली आहे. जी गावकऱ्यांनी एक मोठ्या झाडाखाली नुसतीच ठेवलेली दिसते.

बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या
'कालाय तस्मै नमः '
क्रमश:
ढोलकल, दंतेवाडा

भाग ६ : सा रम्या नगरी...
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी
नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
पुढे...
बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील
सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला
पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.
अस्सल ग्रॅनाईटच्या दगडातून कोरून काढलेली हि मूर्ती तज्ज्ञांच्या मते
११व्या शतकातील आहे. साडे तीन फूट उंचीचे आणि ५०० किलो पेक्ष्या जास्त
वजनाचे हे बाप्पा कालांतराने लोकांच्या स्मृतीतून नाहीसे झाले होते. अनेक
शतकांच्या अज्ञातवासानंतर ते १९४३ साली ब्रिटिशांनी जेव्हा बायलाडिला
टेकड्यांमध्ये लोहाच्या खाणी सुरु केल्यात तेव्हा सापडले. तथापि,
स्वातंत्र्यानंतर हि गणेशमूर्ती परत एकदा विस्मरणात गेली ते अगदी
आत्तापर्यंत.
२०१२ साली दोन पत्रकार खाणींना भेट द्यायला आले असताना सहजच आसपासच्या
जंगलात ट्रेक करत पहाडाच्या ढोलकल नामक शिखरावर चढाई केली. या मोहिमेची जणू
फलश्रुती म्हणून त्यांना ढोलकल गणेशाचे दर्शन झाले. तेव्हा या पुनःशोधाने
आजूबाजूच्या परिसरात बरीच खळबळ उडवून दिली होती.इतके की ढोलकल गणेश मंदिर
यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले.
पायथ्याशी वसलेल्या फरसपाल गावापासून ५ किमी अंतराचा हा जंगलट्रेक आहे.
अतिशय घनदाट जंगल असल्यामुळे परिसरात एकट्याने फिरायला बंदी आहे. गावातून
माहितगार माणूस बरोबर घ्यावा लागतो. तीव्र चढाव असलेला हा ट्रेक बराच कठीण
आहे.
अनेक शिखरे असलेल्या या पहाडांवर इतर तीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत
त्यांपैकी एक सूर्य मंदिर होते. रोज सकाळी सूर्याचे पहिले किरण इथे पडतात.
सूर्यमंदिराच्या समोरच्या शिखरावर खड्या उभ्या कातळावर हा लंबोदर विराजमान
आहे. समोरच्या बाजूला एका खांबावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकत असतो.
२०१७ साली काही असामाजिक तत्वांनी या गजाननाला शिखरावरून खाली फेकून दिले
होते. मात्र छत्तीसगढ पोलीस, CRPF चे जवान आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या
कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून गणेशमूर्तीच्या तुकड्यांचा घनघोर जंगलात
शोध घेऊन त्याची पुन:बांधणी केली आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी हा एकदंत
आपल्या मूळ स्थानी विराजमान झाला.
पुढील मोठे शहर दंतेवाडा. डंकिनी आणि शंखिणी या दोन नद्यांच्या संगमावर
वसलेले हे एक शक्तिपीठ. बस्तरच्या कुलदेवीचे स्थान. प्रचंड मोठा ऐतिहासिक व
सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर आज मात्र माओवाद्यांचे एक मोठे केंद्र
बनलेले आहे. इतके कि नक्षलवाद = दंतेवाडा असे समीकरणच तयार झाले आहे.
दुपार टळायला सुरवात झाली होती. गाडीने दंतेवाडा शहरात प्रवेश केला,
भारतातल्या कोणत्याही छोट्या शहरासारखेच साधे शहर. नदीवर बांधलेला पूल
ओलांडून मंदिराच्या आवारात आलो.
अगदी आताआत्तापर्यंत या मंदिरात स्त्रियांना साडी व पुरुषांना धोतर नेसूनच
प्रवेश होता. लॉकडाऊन नंतर हा नियम शिथिल केला आहे. तिरंगा चौक ओलांडून
गेल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. प्रत्येक तीर्थक्षेत्री असतात
तशी ओळीने पूजासाहित्याची, फूला-हारांची दुकाने पार केली कि पांढऱ्या व
विटकरी रंगात रंगवलेले भव्य प्रवेशद्वार आहे.
बस्तरची आराध्य देवता व एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या या ठिकाणी देवी सतीचे दात पडले होते म्हणून हि दंतेश्वरी.
आता गेल्यावर विस्तीर्ण चौक आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर भगवान विष्णू
दशावतारात विराजमान आहेत. सध्याचे मंदिर १८८० मध्ये वारंगलचा राजा हिराला
चितार यांनी बांधले आहे. वारंगलच्या राजांची कुलदेवी दंतेश्वरी होती आणि ते
राजे विष्णूभक्तही होते. मुख्य द्वारासमोर काळ्या दगडातील कोरीवकाम असलेला
गरुडस्तंभ उभा आहे.
या गरुडस्तंभाला जो कोणी पाठीकडून दोन्ही हातांच्या कवेत घेऊ शकतो त्याच्या
सर्व इच्छा पूर्ण होतात अशी समजूत असल्याने प्रत्येकाने आपापले नशीब
आजमावले. 

मंदिराचे चार भाग पडतात. गर्भगृह, महामंडप, मुख-मंडप आणि सभामंडप. यांपैकी
गर्भगृह आणि मुख-मंडप दगडी बांधकामात असून महामंडप आणि सभामंडपाचे लाकडी
बांधकाम आहे. हे मंदिर सागवानाच्या 24 खांबांवर उभे आहे ज्यावर ओडिशा शैलीत
सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.
गर्भगृहात दंतेश्वरी देवीची सहा हात असलेली काळ्या ग्रेनाईटची मूर्ती आहे.
सहा हातांमध्ये शंख, तलवार, त्रिशूल घंटा, श्लोक आणि राक्षसाचे केस धारण
केलेले आहेत.
या मंदिराच्या स्थापनेमागे अनेक अनोख्या कथा आहेत. त्यांपैकी एका कथेनुसार
बस्तरचा राजा अन्नमदेव जो मुळात वरंगळचा राजा होता त्याला दंतेश्वरी आईने
दृष्टांत देऊन दिग्विजय करण्यास सांगितले. देवी म्हणाली कि तू समोर निघ. मी
तुझ्या मागे मागे येईन. जिथपर्यंत जाशील तितकी भूमी तुझी. त्याप्रमाणे
अन्नमदेव घोड्यावर बसून निघाला. देवी मागेमागे येत होती. मात्र एका ठिकाणी
नदी पार करताना राजाला देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही म्हणून त्याने
मागे वळून बघितले. तर देवी नदी पार करत होती व पाण्यात पाय असल्याकारणाने
पैंजणांचा आवाज येत न्हवता. राजाने वळून बघितल्यामुळे देवी तिथेच थांबली.
नंतर राजाने या जागी तिचे भव्य मंदिर उभारले. नदीकाठी देवीचे चरणचिन्ह
कोरलेले दिसतात. 
डंकिनी व शंखिनी या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर उभे आहे. या दोन्ही
इंद्रावती नदीच्या उपनद्या आहेत. डंकिनी नदीचे उगमस्थान डांगरी-डोंगरी आहे
आणि शंखिनी नदी जवळच्याच बैलाडिला पहाडावर उगम पावते. डाकिनी आणि शाकिणी
या दोन यक्षिणींच्या नावावरून नद्यांना नावे देण्यात आली. या दोन्ही
नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यास भूतबाधा नाहीशी होते अशी
स्थानिकांची श्रद्धा आहे.
हे तंत्र साधनेच मोठं केंद्र असून या मंदिरात २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळी
दिले जात असत. १८८५ साली शेवटचे १५ नरबळी दिल्याची नोंद ब्रिटिश दप्तरात
आहे. मंदिराच्या आत नरबळी देण्याचा दगड अजूनही उभा आहे.
नरबळीची वेदी
आणखी एका कथेनुसार इथल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात डाकिनी आणि शाकिणी आल्या व
त्याला मासे पकडण्याचा गळ घेऊन दोन्ही नद्यांमध्ये एक एक वेळा टाकायला
सांगितले. तसे केल्यावर डंकिनी नदीमधून डंका सापडला तर शंखिनी मधून एक शंख
गळाला लागला. मंदिरात या दोन्ही वस्तू ठेवल्या आहेत. शंखिनी नदी
छत्तीसगडमधली सर्वात छोटी व नैसर्गिकरित्या सर्वाधिक प्रदूषित नदी आहे
जिच्या पाण्यात अतिशय जास्त प्रमाणात लोह मिसळले गेले असल्याने पाण्याचा
रंग लाल झाला आहे. नदीत जलचर नसल्याने व पाणी पिण्यायोग्य नसल्याने व या
नदीला मृत नदी असेही म्हणतात.
मंदिरात विशेष गर्दी न्हवती. छान दर्शन झाले. देवीला साडी अर्पण केली.
मंदिराच्या आत आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती
ठिकठिकाणी ठेवलेल्या आढळतात. काही चांगल्या अवस्थेत आहेत तर काही भग्न.
बाजूलाच भुनेश्वरी देवीचे मंदिर आहे.
आवारात फिरत असतानाच फोन वाजला. माझ्या नवऱ्याचा फोन होता. खरंतर
त्याच्याशी सकाळीच बोलणे झाले होते. “जंगलात जात आहोत त्यामुळे एकदम
रात्रीच बोलू” असे ठरले असताना अचानक मध्येच कसा काय फोन केला असेल बरं असा
विचार करून फोन उचलला तर पलीकडून नवरा पॅनिक झालेला.
"आत्ता कुठे आहात तुम्ही? सुरक्षित आहात ना?" त्याचा काळजीने भरलेला
प्रश्न. म्हटलं "काय झालं रे?" नंतर लक्षात आले कि नागपूरहून निघताना
त्याला गुगल लाईव्ह लोकेशन शेअर केलेले त्यात आमचे 'दंतेवाडा' हे
कुप्रसिद्ध लोकेशन बघून त्याला तिकडे टेन्शन आलेलं. "म्हटलं सगळं ठीक आहे
थांब व्हिडीओ कॉल करते." व्हिडीओ कॉलवर मग त्याला पण देवीचं दर्शन करवलंन.
विजयालक्ष्मीने तिच्या बाबाला पूर्ण मंदिर परिसर फिरून दाखवला. आणि
पुण्यातला जीव भांड्यात पडल्याचा आवाज दंतेवाड्यापर्यंत पोचला.
मंदिर परिसरातून डंकिनी नदीच्या किनाऱ्यापर्यंत जायला पायऱ्यांचा घाट
बांधला आहे. तिथे जरा रेंगाळलो.आता संध्याकाळ झाली होती. मावळतीच्या
किरणांत नदीचे पाणी लाल सोनेरी रंगांत चमकत होते. काही स्थानिक तरुणी
घाटावर आलेल्या दिसल्या. त्यातल्या एकीची विजयालक्ष्मीसोबत गट्टी जमली.
त्या ताईने विजीच्या हातातील फुले नदीत प्रवाहित करून दिली. मुलींना टाटा
करून परतीचा प्रवास सुरु केला.
परत एकदा पूल ओलांडून मुख्य रस्त्याला लागलो. जवळजवळ ९० किमी अंतर पार
करायचे होते. 'लाल-सावलीच्या' या प्रदेशातून खूप रात्र होण्यापूर्वी बाहेर
पडणे भाग असते. त्यामुळे गीदम शहर येईपर्यंत कुठेही थांबता आले नाही.
बाहेरून रातकिड्यांचा आवाज येत होता. अतिशय व्यस्त दिवस घालवल्यानंतर आता
सगळे गाडीत शांत बसून होते.
रात्रीच्या अंधारामुळे म्हणा किंवा मनातल्या भीतीमुळे म्हणा पण आजूबाजूच्या परिसराची जरा जरा भीती वाटायला लागली होती.
गीदम पार केल्यावर आपण कोअर नक्षलवादी भागातून बाहेर पडल्याचे
किरणभैय्यांनी जाहीर केले व रस्त्याच्या कडेला एका लहानशा टपरीसमोर गाडी
थांबवली. तेथे चहा घेऊन पुढे जगदलपूरच्या दिशेने निघालो. भैय्यांबरोबर
दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून सकाळीच ८ वाजता रिसॉर्टवर भेटायचे पक्के करून
गाडी नमन बस्तरच्या दारात उभी केली.
रिसॉर्ट वर पोचल्यावर फ्रेश होऊन जरा आराम केला. लॉन वर जागोजागी
शेकोट्या लावलेल्या होत्या. त्याचा आस्वाद घेत दिवसभराच्या क्षणांना उजाळा
देत एका सुंदर दिवसाची सांगता झाली.
क्रमशः
(टीप :
१. वेळेच्या अभावी आम्हाला ढोलकल गणेशाचे दर्शन घेणे शक्य न्हवते मात्र
'गजानन ट्रॅव्हल्स' च्या सौजन्याने काही फोटो मिळाले तेच येथे दिले आहेत)
२. काही दिवस पावसाळी भटकंती करायला मध्यप्रदेशातील पंचमढी येथे जात आहे. त्यामुळे पुढील भाग जरा उशिराने येतील)
:09

भाग ७ : ढोलकल, दंतेवाडा
दुसऱ्या दिवशी दि. २८-१२-२०२२ रोजी सकाळीच ७ वाजता तयार होऊन रूम बाहेर
पडलो. हवा एकदम स्वच्छ होती. कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ रिसॉर्टच्या
आवारात हिंडत फिरत वेळ घालवला. थोडी फोटोग्राफी केली. तिघी जेष्ठ महिला
गवतावर निवांत बसून गप्पांचा आस्वाद घेत होत्या तर मी आणि लेकीने झाडाला
टांगलेल्या झुल्यावर बसून झोके घेतले. भोजनगृहात जाऊन नाश्ता आटोपला.
ठरल्यावेळेवर किरणभैया हजर झाले.
आजच्या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे चित्रकोट धबधब्याला भेट द्यायची होती.
शिवाय जगदलपूर शहरात काही विशेष असेल तर ते देखील बघायचं होतं. छत्तीसगढची
सांस्कृतिक राजधानी असलेल्या जगदलपूर शहरदर्शनाने आजच्या भटकंतीची सुरवात
झाली.
काकतीय वंशातील १३वा राजा दलपत देवाने १७७० मध्ये आपली राजधानी मधोता येथून इंद्रावतीच्या दक्षिण तटावर हलवली आणि त्याचे नाव जगदलपूर ठेवले. राजधानीचे स्थलांतर आणि शहराच्या नामकरणाच्या इतिहासाच्या मनोरंजक कथा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानुसार एके दिवशी राजा दलपत देव आपल्या साथीदारांसह इंद्रावतीच्या या बाजूला शिकारीसाठी आला होता. तेव्हा एका सशाच्या भीतीने त्याचे पाळीव कुत्रे पुढे सरकले नाहीत. हे त्याने आपल्या साथीदारांना सांगितल्यावर या जागेला वीरभूमी मानून राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात मराठ्यांच्या आक्रमणाची भीतीही होती आणि हे देखील राजधानीच्या बदलाचे एक कारण मानले जाते.
१७७० मध्ये जेव्हा काकतियांची राजधानी येथे हलवण्यात आली तेव्हा ही एक
‘महारा’ समाजाची ५० झोपड्यांची छोटीशी वस्ती होती आणि त्याचे प्रमुख जगतु
महारा यांच्या नावाने 'जगतुगुडा' म्हणून ओळखले जात असे. जगतूच्या नावातले
'जग' आणि आणि दलपतदेववरून 'दल' हे नाव घेऊन त्याचे नाव ‘जगदलपूर’ पडले.
आपल्या कुलदेवीची परवानगी घेऊन महारा समाजाने काकतीय राजांना या ठिकाणी
स्थायिक होण्याची परवानगी दिल्याचा उल्लेख आहे. राजा दलपतदेवने शेतीच्या
सिंचनासाठी म्हणून इंद्रावतीच्या वळणावर दलपत सागर नावाचा तलाव खोदला जे आज
छत्तीसगड मधील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर आहे.
पुढील शंभर वर्षांत येथे ४०० झोपड्या आणि एक 'राजमहाल' असल्याचा उल्लेख
आढळतो. हा राजमहाल म्हणजे आकाराच्या दृष्टीने इतरांपेक्षा जरा मोठी, माती -
विटांच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली झोपडी. पुढे इंग्रजांची मदत घेऊन
इथल्या संस्थानिकांनी लंडनच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्याची योजना
केली होती. ब्रिटीश प्रशासक कर्नल जेम्स यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न
केले. रस्त्यांचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी पुरेशी जागा
सोडण्यात आली. अरुंद गल्ल्या हटवून विस्थापितांना मोकळ्या जागेत स्थायिक
करण्यात आले. त्या काळात जातीनुसार मोहल्ले ('पारा-टोला') वसवले. जगदलपूरला
'चौक-चौराहों का शहर' हे विशेषण याच काळात प्राप्त झाले.
आज उभा असलेला राजमहाल मात्र महाराजा भैरमदेव यांनी बांधला. उत्तरेला
सिंहद्वारावर दंतेश्वरी मंदिर, राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण, शीतला आणि
कर्णकोटीन मंदिरे, दक्षिणेला मावळीमाता, राम आणि जगन्नाथ मंदिरे, पूर्वेला
बालाजी मंदिर आणि पश्चिमेला काली कंकालीन मंदिर बांधले गेले व १८९१ मध्ये
रुद्रप्रतापदेव सिंहासनावर आरूढ झाले.
इथले शस्त्रागार आणि येथे संग्रहित केलेली स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या
काळातली जुनी छायाचित्रे आणि हा इथला एक महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे
राजमहल हा बस्तरमधील काकतीय राजांच्या ७०० वर्षांच्या इतिहासाचा मूक
साक्षीदारही मानला जातो. 
१८९१ साली राजा भैरम देवाच्या मृत्यूनंतर त्यांचा सात वर्षीय मुलगा
रुद्रप्रताप देव बस्तरच्या गादीवर बसला त्यावेळी इंग्रजी राजवट चरम शिखरावर
होती. रुद्र प्रताप त्याच्या काकाच्या, कालिंदर सिंहच्या देखरेखीत
राज्यकारभार बघू लागला. कालांतराने रुद्र प्रताप उच्च शिक्षणासाठी
इंग्लंडला गेला असता कालिंदर सिंहने आदिवासी प्रजेला आपल्याकडे वळवून रुद्र
प्रतापच्या विरोधात उभे केले.
पुढे रुद्रप्रताप देवच्या निधनानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलीला, प्रफुल
कुमारीला बस्तरची कार्यवाही महाराणी घोषित करून तिच्या अल्पवयीन मुलाचा
प्रवीरचंद्र भंजदेव याचा राज्याभिषेक केला. प्रफुलकुमारी अतिशय लोकप्रिय
महाराणी होती. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची पोस्ट - ग्रॅज्युएट असलेल्या या
महाराणीने बस्तरच्या आधुनिक विकासात फार महत्वाचे योगदान दिले आहे. अनेक
दवाखाने, शाळा तिने स्थापन केल्या. पुढे अपेंडिसाइटिसच्या उपचारांसाठी तिला
लंडन येथे हलवले असता चुकीच्या उपचारामुळे महाराणीच्या मृत्यू ओढवला (काही
तज्ज्ञांच्या मते तिला मुद्दाम चुकीची ट्रीटमेंट देण्याचे इंग्रज सरकारचे
आदेश होते).
महाराणीच्या मुलगा प्रवीरचंद्र भंजदेव हा बस्तरच्या इतिहासातील सर्वात
लोकप्रिय शासक ठरला. १९४८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने
बस्तर संस्थानाचे विलीनीकरण झाले. त्या काळात बस्तरचे महाराज प्रवीरचंद्र
भांजदेव आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय होते. महाराज प्रवीरचंद्रांनी
बस्तरच्या आदिवासींसाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे कि आजही त्यांना
आदिवासींचा देव म्हटले जाते. आदिवासींचा आवाज लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत
पोचवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र 'आदिवासी विकास पार्टी'ची स्थापना केली.
त्यांच्या पार्टीने विधानसभेत १० पैकी ९ जागांवर दणदणीत यश मिळवलं होतं. हि
पार्टी बस्तरच्या जन, जल आणि जंगल यांच्या कल्याणासाठी कार्यरत होती. पुढे
१९६१ भारत सरकारशी झालेल्या मतभेदामुळे मध्ये त्यांनी स्वत:ला भारताच्या
राजवटीतून मुक्त करून बस्तरमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव
मांडला ज्यामुळे त्यांना सरकारने काही दिवस कारावासात टाकले होते. २५ मार्च
१९६६ रोजी राजाजींची पोलिसांकरवी गोळीबार करवून हत्या करण्यात आली. या
हत्याकांडात राजवाड्यातील बरेच लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर भयंकर दंगली
उसळल्या. बस्तरच्या जनतेत सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला.
सरकारविरोधी द्वेषभावना पराकोटीला पोहोचली आणि याच द्वेषाला आधार बनवत
छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी चंचुप्रवेश केला. आणि आज हीच भारताची सर्वात
मोठी अंतर्गत समस्या बनली आहे.
सध्या राजमहालात काकतीय घराण्यातील २३वे राजा कमलचंद्र भांजदेव आपल्या कुटुंबासहित राहतात.
जगदलपूर राजमहलच्या आवारातच दंतेश्वरी मंदिर आहे. हिला 'छोटी माँ' म्हणतात. दंतेवाडा येथील दंतेश्वरी देवी 'बडी माँ'. मंदिरात दंतेश्वरी समवेत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीची पूजा-अर्चना होते. मूळ मंदिराप्रमाणेच येथेही (इच्छापूर्ती करणारा) गरुडस्तंभ आहेच. त्याच्याकडे "काल फ्रुटी प्यायल्याने बसलेला घसा लवकर बरा व्हावा" अशी लेकीने इच्छा व्यक्त केली. बाजूलाच दंतेश्वरीची छोटी बहीण मानलेल्या हिंगलाज देवीचे प्राचीन मंदिर पण आहे.
मंदिराच्या महाद्वाराबाहेर चौकात एक लाकडी रथ उभा दिसतो. 'बस्तर दशहरा'
या इथल्या प्रसिद्ध दसऱ्याच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या या रथाची कहाणी
मोठी रोचक असून ती इथे सांगणे म्हणजे फार अवांतर होईल. (त्यासाठी 'बस्तर
दशहरा' वर स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार आहे).
दंतेश्वरीच्या खालोखाल बस्तरचे आराध्य दैवत म्हणजे जगन्नाथ. राजमहाल
परिसरात दुसरे प्रमुख मंदिर श्री जगन्नाथाचे आहे. १५व्या शतकात बस्तरचे
महाराज पुरुषोत्तम देव हे स्वतः जगन्नाथपुरीला पायी चालत जाऊन प्रभूंच्या
मूर्ती घेऊन आले. ज्यांची स्थापना जगदलपूरच्या जगन्नाथ मंदिरात झाली.
जगन्नाथपुरीच्या धर्तीवर येथे देखील ऐतिहासिक गोंचा उत्सव साजरा होतो ज्यात
बलभद्र-सुभद्रेसहित भगवानांची रथयात्रा निघते.
सध्याचे राजा कमलचंद भांजदेव हे ‘इथल्या भूमीचे पुजारी’ या नात्याने
चांदीच्या झाडूने 'छेरा पोरा' विधी करतात. जगन्नाथपुरीत सोन्याच्या झाडूने
हा विधी केल्यानंतरच बस्तरमध्ये हा विधी केला जातो.
मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंनी देवड्या असून येथे पहारेकरी राहत असत. आत
गेल्यावर एखाद्या जुन्या वाड्याप्रमाणे चारी बाजूंनी अनेक खांबांच्या
ओसऱ्या आणि मध्ये विस्तीर्ण चौक आहे.
एका बाजूच्या प्रशस्त दालनात भगवान जगन्नाथाच्या चौदा प्रकारच्या वेशभूषेतील शृंगार केलेल्या प्रतिमा मांडून ठेवल्या आहेत. 
समोरच्या सिरसार चौकात बस्तरच्या पुरातात्विक संग्रहालय आहे. थोडं पुढे
गेल्यावर दलपत तलावाच्या काठी वेंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. २०
वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेले हे मंदिर आज जगदलपूरातील एक प्रमुख धार्मिक
स्थळ बनले आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा आकार एखाद्या
रथाप्रमाणे आहे.
परिसरात विष्णूच्या दशावतारातल्या प्रतिमा जागोजागी स्थापन केलेल्या आढळतात. 
आतमध्ये बालाजीसमोर काही गायक वादक संगीतसेवा देत होते. गरमगरम शिऱ्याचे प्रसाद वाटप चालू होते.
थोडावेळ तेथेच मंडपात बसलो. परिसराचे फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.
क्रमशः
:13

भाग ८: चौक - चौराहों का शहर - जगदलपूर
जगदलपूर शहरातून पश्चिमेकडच्या रस्त्याला गाडी लागली.एकही खड्डा नसलेली
काळीभोर डांबरी सडक. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडुलिंब, साल, काटेसावरीचे
उंच उंच वृक्ष होते. हि सगळी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.
रस्त्याचे नाव 'राम वन गमन पथ' असे आहे.
आजचा निसर्ग कालच्या पेक्षा वेगळा. काल घनदाट अरण्य बघितले तर आज पठारी
माळरान. दूरवर नजर जाईल तिथवर लालसर तपकिरी माती. मातीखाली दबलेले पण
अर्धवट डोकं वर काढणारे कठीण खडक. आज अधून मधून जरा ढगाळ हवामान होते पण
त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता.
जागोजागी शिंदीची झाडे दिसत होती. शिंदीच्या झाडाला इकडे छिंद म्हणतात. गाव
लागले कि दूरवर पसरलेली हिरवीगार भात-खाचरे दिसत. त्या हिरवाईत लाल लाल
कौलारू घरे. वाटेत एक 'छिंदगाव' नावाचे गाव लागले. इथले मुख्य उत्पन्नाचं
साधन म्हणजे म्हणजे शिंदीच्या झाडाचा रस ज्याला 'सल्फी' म्हणतात. हे
छत्तीसगढचे खास पेय. नीरेसारखाच झाडाला चिरा देऊन त्यात पाझरणारा रस गोळा
करतात. सकाळी घेतलं तर फार पौष्टिक. सूर्य डोक्यावर आला कि मग त्याची ताडी
बनते. जागोजागी झाडांना रस काढण्यासाठी मडकी लावून ठेवलेली दिसत होती. काही
ठिकाणी सल्फी काढण्याचे काम चालू होते.
गाडीने मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळण घेतलं. आता लालसर कच्च्या मातीची सडक
सुरु झाली. या रस्त्याचे नाव 'विनता घाटी'. बरेच ठिकाणी रस्त्याने लोक
खांद्यांवर मोठमोठी भांडीकुंडी घेऊन जाताना दिसत होते. मग कळले आज इथला
'जरू तिहार' नावाचा स्थानिक सण आहे. आपल्या नागपंचमीसारखं आज माती खोदत
नाहीत किंवा शेतीची कोणतीही कामे करत नाही. पूर्ण दिवस आपल्या कुटुंबियांसह
घालवतात.
मटनार टेकड्यांमधेच शहरापासून साधारण ५० किमीच्या अंतरावर तामडा घुमर
नावाचा बारमाही धबधबा आहे. तामडा नावाच्या नाल्यावर आहे म्हणून तामडा घुमर.
या धबधब्याची विशेषता म्हणजे हा silent fall आहे. अगदी जवळ जाईपर्यंत याची
उपस्थिती लक्षात येत नाही. अतिशय कमी आवाज करत कोसळणारा धबधबा आम्ही
पहिल्यांदाच पहिला. १०० फुटांवरून खाली झेप घेत तामडा नाला चार किमी अंतर
कापून पुढे इंद्रावतीला मिळतो.
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
गाडी पार्किंगला लावून १०० मीटर चालत गेलं कि आपण थेट धबधब्याच्या
माथ्यालाच जाऊन पोचतो. इथे सुरक्षाकुंपण वगैरे काही नाही. त्यामुळे फार
काळजी घ्यावी लागते. "घसरला तो पसरला आणि थेट शंभर फूट खाली कोसळला".
नाल्याचं पाणी अतिशय नितळ स्वच्छ त्यामुळे त्याला "नाला का म्हणावं" हा
प्रश्न आमच्या शहरी मनाला पडला. लहानशी नदीचं कि हि. इथे बाराही महिने
मोरांचे वास्तव्य असते म्हणून याचे दुसरे नाव 'मयूर घुमर'
नदीच्या काठाकाठाने जरा झाडी आहे. छोटासा trail म्हणा. तिथे पलीकडे काही
स्थानिक गावकरी कुटुंबे दिसत होती. बायका चुल मांडून स्वयंपाक करत होत्या.
पुरुष नदीतून पाणी आणून देत होते तर लहान मुले पाण्यात खेळत होती.
त्यांच्या गायी तिथे बाजूलाच चरत होत्या.
म्हटलं “चला, आपण हि तिकडे जाऊया”. झुडपांतून वाट काढत निघालो. मी पुढे,
माझ्या मागे विजी, तिच्यामागे आई आणि दोघी मावश्या येत होत्या. अवघड जागा
असेल तर मी झुडूप हाताने बाजूला सारून धरायचे आणि मग या साऱ्याजणी तेवढी
जागा पार करायच्या असं चाललं होतं. वाट संपता संपता एका अवघड जागी मी झुडूप
हलवले आणि दगडावर पाय ठेवणार इतक्यात अगदी जवळून झपकन काहीतरी विजेच्या
वेगाने आडवे गेले. बघते तर तपकिरी काळा साप. क्षणार्धात बाजूच्या झाडीत
दिसेनासा झाला.
या अनपेक्षित प्रकाराने अंगावर सरसरून काटा आला. रस्ता संपलाच होता. तसेच
समोर जाऊन झाडीतून बाहेर पडले. बाकीच्यांना हात देऊन मोकळ्यावर घेतले आणि
नंतर नागदेवतेनी दिलेल्या या अकल्पित दर्शनाबद्दल सांगितले.
समोर नदी वाहत होती. पात्र अगदीच उथळ आहे. पाण्यात लहान मोठे दगड आहेत
तिथे बराच वेळ खेळलो. पाणी छान उबदार होते. पाय सोडून निवांत बसलो.
आमच्या सारखेच अजून काही पर्यटक तिथे आले होते. त्यातील काही लोकांचा
धबधब्याच्या अगदी कड्यावर जाऊन पाण्यात उभे राहून सेल्फी घेण्याचा
कार्यक्रम सुरु झाला. स्थानिक स्वयंपाकवाल्यांनी त्यांना तसे न करण्याबद्दल
हटकले असता जरा तू तू मैं मैं करून त्या लोकांनी काढता पाय घेतला.
पुढचा थांबा मेन्द्री घुमर नावाचा मोसमी धबधबा. खरंतर हा एक 'व्यू
पॉईंट' आहे. पठाराच्या अगदी कड्यावर जाऊन खाली दरीचे सुंदर दृश्य पाहता
येते. इथूनच लांबवर मटनार नाल्यावर स्थित मेन्द्री धबधब्याचे दर्शन होते.
पावसाळा नसल्याने अगदी दिसेल न दिसेलशी बारीक धार कड्यावरून कोसळत होती.
मात्र मान्सून मध्ये जेव्हा हा प्रपात आपल्या पूर्ण दिमाखात असतो त्यावेळी
त्याला ‘घाटी की धुंध’ असा किताब बहाल केल्या जातो. अलीकडे मोकळे पठार आहे.
कड्याजवळचा खडक अगदी कच्चा आहे. सतत खाली दरीत ढासळत असतो म्हणून
कड्याच्या थोडे अलीकडे तारेचे कुंपण घातलेले आहे. मघाचेच महाभाग आता
कुंपणापलीकडे जाऊन सेल्फी घेताना दिसत होते. 

अनवट अस्पर्श निसर्ग. पायाखाली तपकिरी माती आणि लहान मोठे दगड विखुरलेले
होते. सहज चाळा म्हणून एक दगड उचलला तर तो आकाराच्या मानाने जरा जड वाटला.
इथले सगळेच दगड अंमळ वजनदार लागत होते. मग लक्षात आले कि हे साधे दगड नसून
नक्कीच कोणतीतरी खनिजे आहेत. कदाचित लोह किंवा मँगनीज. भूविज्ञानाच्या
अभ्यास करत असतानाचे दिवस आठवले. भारताच्या नकाशातील खाणींचे विभाग आणि
खनिज संपत्तीचे वितरण. Ph.D करत असताना केलेली सर्वेक्षणे डोळ्यासमोरून
तरळून गेली. छान वाटले. nostalgia. अशा शांत जागी बसून एकटीनेच स्मरणरंजन
करण्यातही मजा आली. इथून पाय निघत न्हवता. जरा वेळाने निघालो. गाडीत येऊन
बसलो पण मन त्या पठारावरच अडकले होते.
रस्त्यात एका ठिकाणी थांबून जेवणे उरकलीत. मेनू तोच. भात, भाजी व लोणचे.
नॉनव्हेजचे मात्र बरेच प्रकार होते. देसी भूना मुर्ग आणि चापड़ा चटनी (लाल
मुंग्यांची चटणी) हि इथली वैशिष्ट्ये. झाडांवर घरटे करून राहणाऱ्या या
मुंग्यांना मीठमिरीबरोबर वाटले कि झाली बेसिक चटणी तयार.
आता दुपार टळायला सुरवात झाली होती. अजून आजचे खास आकर्षण बाकी होते.
किंबहुना मुद्दामच चित्रकोट भेट सर्वात शेवटी ठेवली होती. भारतातील प्रमुख
धबधब्यांपैकी एक आणि सर्वात रुंद व मध्य भारतातील सर्वात मोठा जलप्रपात
असलेल्या चित्रकोटच्या रस्त्याला लागलो. हा धबधबा जगदलपूरपासून ४० कि.मी
आणि रायपूर पासून 273 कि.मी. अंतरावर आहे. ३० मीटर उंचीचा हा फॉल सुमारे
३०० मीटर रुंद आहे. इंद्रावती नदीवर असलेल्या या प्रपाताला घोड्याच्या
नालेसमान आकारामुळे भारताचा नायगारा देखील म्हटले जाते.
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
इंद्रावती नदी ओडिशातील कालाहांडी येथे उगम पावून महाराष्ट्र - छत्तीसगढ -
तेलंगणा सीमेवर गोदावरीला मिळते. इंद्रावती नदीच्या निर्मितीमागे एक
पौराणिक कथा आहे. एकेकाळी ही जागा चंपा आणि चंदनाच्या झाडांनी भरलेली होती,
ज्यामुळे संपूर्ण जंगल सुगंधित होत असे. या सुंदर ठिकाणीं एकदा इंद्र आणि
इंद्राणी काही काळासाठी राहायला आले. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत
जंगलात फिरत असताना इंद्र एका उदंती नावाच्या वनकन्येवर भाळला. दोघे सोबत
राहू लागले. इकडे इंद्राणीला या बाबत आदिवासींकडून कळले असता तिने चिडून
दोघांना वेगळे होण्याचा शाप दिला आणि स्वतः स्वर्गलोकी परत न जाता तिथेच जन
कल्याणासाठी राहण्याचा निश्यय केला आणि स्वतःला नदीच्या रूपात प्रवाहित
केले. हीच इंद्रावती नदी. एकाच पहाडावर उगम पावलेल्या इंद्रावती, इंद्रा
आणि उदंती या तीन नद्या कुठेही एकमेकांना न भेटता वाहतात.
चित्रकोट आल्याची खबर लांबवरून येणाऱ्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने
मिळाली. पार्किंगला गाडी लावून चालत निघालो. रस्त्याच्या दुतर्फा
सोव्हिनर्स, स्थानिक चीजवस्तू विकणारी दुकाने होती पण येताना बघू म्हणत पाय
भराभरा उचलत धबधब्यापाशी पोचलो. आणि … निशब्द...
निसर्गाचा विराट आविष्कार..
प्रथम तुज पाहता ... समर्थांचे सुप्रसिद्ध काव्य आठवले.
।। गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।
पांढऱ्या शुभ्र जलधारा प्रचंड वेगाने कड्यावरून खाली कोसळत होत्या.
पर्यटकांची बरीच गर्दी होती. पण जागोजागी कुंपणे आणि रक्षक गस्त घालत
असल्याने व्यवस्थित सुरक्षा होती.
किती बघू आणि काय बघू असे होत होते. बरेच फोटो काढले तरी समाधान होईना.
खाली जायला पायऱ्यांची वाट बांधली आहे. त्यावरून खाली जायला निघालो.
अर्ध्या वाटेवर एक फाटा 'चित्रकोट नेचर ट्रेल' कडे जातो.
१० मिनिटात खाली नदीकाठी पोचलो. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जायला नावा
उपलब्ध आहेत. एका वेळेला दहा जणांना वल्हीच्या नावेत बसून जात येतं. तसेच
सिंगल मोटारबोटीची सोयदेखील आहे. लाइफ जॅकेट चढवून नावेत स्वार झालो.
दोन नावाडी चप्पू चालवत होते. त्यांनी अर्धवर्तुळाकार मार्गाने नेत
धबधब्याच्या अगदी जवळ नेले. कोसळणाऱ्या प्रपाताचा भयंकर आवाज येत होता.
।। गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला,
कड्याशी आदळे धारा, वात आवर्त होत असे ।।
पाण्याशी तुषार उडून पांढरे धुके तयार झाले होते. अंगावर थंडगार तुषारांचा
वर्षाव झाला. कपडे, चष्मा, केस, कॅमेरा, मोबाईल सगळ्यांवर पाण्याचे बारीक
बारीक थेंब चमकायला लागले.
।। तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात,
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ।।
कड्याच्या पायथ्याशी, धारांच्या मागे, घळ तयार झाली आहे. घळीमध्ये
दुर्गादेवीच्या प्राचीन मूर्ती आणि अनेक शिवलिंग आहेत. कोसळत्या जलधारांनी
त्यांच्या अखंड अभिषेक चालू असतो. खूपच अद्भुत दृश्य होते.
।। कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ।।

नावेने वळण घेतले, धबधब्यापासून थोडं दूर निघालो आणि सूर्यनारायणाने कृपा
केली. ढग बाजूला होऊन उन्हाची एक तिरीप थेट धारांवर आणि ... कमानदार
इंद्रधनुष्य अनपेक्षितरित्या साकार झाले. एक विलक्षण सुंदर अनुभव घेतला.
परत काठावर आलो. आज्जीमंडळी परतीच्या वाटेला लागल्या. आम्ही दोघी मायलेकी
मात्र बराच वेळ नदीकाठावरच रेंगाळलो. दगडावर बसून खूप गप्पा केल्या,
एक छोटी मैत्रीण भेटली. इंद्रावतीतले छोटे छोटे खडे गोळा केले.
इथेच तो "इंद्रधनुष्यात पिंक रंग का नाही?" हा प्रश्न आम्हाला पडला. एक
सुंदर संध्याकाळ.. आम्हा दोघींचीच.. मनात आलं कि “विजी लवकरच मोठी होईल,
तिच्या विश्वात रमेल, पण हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. आम्हा
दोघींच्याच.”
संध्याकाळ झाली होती. परतीच्या वाटेवर एक शिव मंदिर आहे. तिथे सगळ्या आमची वाट बघत बसल्या होत्या. जाताना बस्तर आर्टची बरीच दुकाने आहेत. कास्ट आयर्न चे हत्ती घोडे, लाकडी खेळणी, विंड चाइम्स असे बरेच काही विकायला होते. थोडीफार खरेदी केली. रिसॉर्टवर आलो. गाडीचा हिशोब चुकता केला.
आज रायपूरसाठी निघायचे होते. रात्री उशिराची बस होती. दहा वाजता चेकआऊट
करून जगदलपूर मेन बस स्टॅन्ड गाठला. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली.
इंद्रावतीचा पूल पार करून गाडीने वळण घेतले. शहराचे दिवे दूर जाताना दिसत
होते आणि आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप
घेतला.
क्रमशः
बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)
शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते. आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
पुढे…
भल्या पहाटे रायपूरच्या बस स्टॅन्डवर गाडी पोचली. कोणताही प्रवास असो, मला
शक्यतो वाहनात झोप लागत नाही त्यामुळे घरी जाऊन छोटीशी झोप काढली. उठून
ताजेतवाने होते तो मावशीच्या हातचा गरमागरम नाश्ता समोर हजर. त्यावर ताव
मारत आजच्या दिवसाचे प्लॅनिंग सुरु होते. सिरपूरला जैन मंदिरांच्या
पुरातात्विक स्थळाला भेट द्यायची होती पण ते ठिकाण काही कारणामुळे
तात्पुरते बंद आहे असे समजले. मग मावशी म्हणाली कि चला आपण 'पुरखौती
मुक्तांगणा'ला भेट देऊया.
रायपूर पासून २० किमी अंतरावर मोकळ्या प्रांगणात वसलेले हे ‘बस्तर आर्ट’ चे
मोठे केंद्र आहे. ज्यामध्ये छत्त्तीसगडमधील समृद्ध आदिवासी संस्कृती,
लोककला, ग्रामजीवन, प्रमुख पर्यटन स्थळे इत्यादी प्रदर्शित करण्यात आले
आहे.
२०० एकर जागेवर पसरलेल्या या मुक्तांगणात प्रामुख्याने बस्तर आर्ट या
कलाप्रकाराला विशेष महत्व असून यात भांडी, हस्तकला, शिल्पकला इत्यादी
बघावयास मिळतात.
बस्तरच्या आदिवासी समुदायात पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंतु प्रसिद्धीच्या
अभावी ती स्थानिक हाट आणि बाजारांपुरती मर्यादित असलेली हि कला आता जगभरात
‘बस्तर आर्ट’ या नावाने ओळखली जाते. आधुनिक यंत्रांचा वापर न करता
पारंपरिक साधनांनी केलेल्या लाकूडकाम, बांबूकाम, मातीकाम (टेराकोटा) आणि
धातूकला यांचा समावेश होतो. यातही बस्तर संस्कृती, सण, देवी-देवतांच्या
मूर्ती व प्राणी बनवण्यासाठी लाकडी कलाकृती; घराच्या सजावटीसाठी बांबूच्या
चादरी, खुर्च्या, दिवाणखाना, टेबल, टोपल्या, चटई, इ वस्तू; टेराकोटाच्या
देवांच्या मूर्ती, सजावटीची भांडी, फुलदाणी, भांडी आणि घरगुती सामान बनवले
जाते. मेटल आर्ट्समध्ये तांबे आणि कथील मिश्रित धातूच्या कलाकृती बनविल्या
जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीच्या शोभेच्या मूर्ती आणि
गृहसजावटीचे सामान तयार केली जाते.
मुक्तांगणात या सगळ्यांचे प्रदर्शन मांडले आहे. स्थानिक आदिवासी घरांच्या
प्रतिकृती, व्यवसायानुरूप घरांच्या वेगवेगळ्या रचना, प्रसिद्ध स्थानांच्या
मूळ आकारातील प्रतिकृती बघायला मिळतात.
इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घोटुल. घोटुल इथल्या आदिवासींच्या परंपरेचा
भाग आहे. घोटुल म्हणजे एकप्रकारचे यूथ होस्टेल. अविवाहित मुले मुली
गावाबाहेरच्या एका मोठ्या घरात काही दिवस एकत्र राहून आपापल्या जीवनासाथीची
निवड करतात. हे घोटुलची पूर्ण व्यवस्था मुले मुली मिळूनच बघतात.
स्वयंपाकापासून तर रंगरंगोटी, डागडुजी व इतर सर्व कामे. सायंकाळी त्या
समाजाशी संबंधित नृत्य-संगीत, कला आणि कथाही घोटुलमध्ये सांगितल्या जातात.
इथे विवाहितांना प्रवेश नाही.
मुक्तांगणात बराच वेळ घालवून परत आलो. दुपारी ज्योती मावशीकडे चहाचे आमंत्रण होते.
सायंकाळी रायपूर पासून १७ किमी अंतरावर असलेल्या 'चंदखुरी' येथील
कौसल्या मंदिराला भेट द्यायचे ठरले. रामायणातील दक्षिण कोसल म्हणजे आजचे
बस्तर. राणी कौसल्येचे माहेर.
मूळचे 'चंद्रपुरी' असे नाव असलेले हे गाव कोसला जनपदाची राजधानी होती.
कौशलचा राजा भानुमंताची कन्या कौशल्या हिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथ
याच्याशी झाला होता.राजा भानुमंतने कौसल्येला लग्नात दहा हजार गावे भेट
म्हणून दिली होती. त्यात तिचे जन्मस्थान चंद्रपुरीचाही समावेश होता.
मंदिरात माता कौशल्याची व बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापन केलेली आहे.
प्रभू राम वनवासातून आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर
कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघी चांदखुरी येथे येऊन राहिल्याची कथा
या भागात प्रचलित आहे. इथल्या प्राचीन चंद्रसेन तलावाच्या मधोमध ७व्या
शतकात हे श्रीराम आणि कौसल्येचे मंदिर निर्माण केले. गमतीची गोष्ट म्हणजे
विस्मरणात गेलेल्या या मंदिराचा शोध एका म्हशीमुळे लागला. चंद्रसेन
तलावाच्या मधोमध असलेल्या एका बेटावर हि म्हैस पोचली आणि परत येता येईना
म्हणून तिची सुटका करण्यासाठी गावकरी तेथे गेले आणि त्यांना हे मंदिर
भग्नावस्थेत सापडले. २०२१ साली मंदिरा मूळ आराखडा कायम ठेऊन परिसराचे
नूतनीकरण व तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले.
जुन्या मूर्तीच्या बरोबरीने एक आधुनिक पद्धतीची अतिशय देखणी प्रतिमा पण
येथे स्थापन केली आहे. देवासमोर हात जोडून उभे असता विजयलक्ष्मीने
उत्स्फूर्तपणे गाण्याच्या क्लास मध्ये शिकलेले 'कौशल्या दशरथ के नंदन" हे
भजन म्हणायला सुरवात केली. खड्या आवाजात तालासुरात भजन म्हणता असताना
आजूबाजूला बराच श्रोतृवर्ग गोळा झाला. शेवटच्या 'राम सिया राम' या ओळींना
तर सर्वानी एकसुरात साथ दिली. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विजी
अचानक सेलेब्रिटी बनली.
या गावाचे आणखी एक प्रचलित नाव म्हणजे ‘वैध चांदखुरी’. एका कथेनुसार राम
रावण युद्धात लक्ष्मणावर उपचार करणाऱ्या सुषेण वैद्यांचा इथे आश्रम होता.
वाली पत्नी ताराचे वडील असलेल्या वानरश्रेष्ठ सुषेण वैद्यांचे दंडकारण्य हे
मूळ निवासस्थान होते. राज्याभिषेकानंतर श्रीरामाने वैद्यराजांना आपल्या
आजोळी चंद्रपूरीला येऊन राहण्याची विनंती केली व इथे आयुर्वेदिक प्रयोगशाळा
व उपचारकेंद्र स्थापन करून दिले. वैद्यकशात्रावरील काही प्राचीन
भूर्जपत्रे आजूबाजूंच्या गावात सापडली आहेत. इथेच सुषेण वैद्यांची समाधी
आहे.
अतिशय रमणीय परिसरात वसलेल्या या मंदिराची भेट घेऊन रायपूर शहरात रात्रीचा फेरफटका मारला.
मोतीबाग परिसरातील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये जाऊन चवदार भोजनाचा आस्वाद
घेतला. ज्योती मावशीचा निरोप घेऊन घरी आलो. रात्री उशीर झाला तरी गप्पा
काही संपेना. रंजू मावशी आणि माझी आई या दोघी मावस बहिणी. कितीतरी वर्षांनी
निवांत भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मावशी म्हणाली "४०
वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पण इतक्या वर्षांत माहेरचे कोणी पहिल्यांदाच
असे निवांत येऊन राहिले आहे. खूप छान वाटलं".
पुन्हा एकदा 'वंदे भारत एक्सप्रेस' नी नागपूरला परतलो. घरी आलो तर विजयालक्ष्मीचा बाबा सरप्राईज भेट द्यायला हजर होता. दिवसभर विजयालक्ष्मीची बाबाच्या गळ्यात पडून ट्रिपच्या गमती सांगत उजळणी सुरु होती. आपण सर्वांनी जायचं परत एकदा रंजू आज्जीकडे जायचं असा निश्चय करून एक सुंदर ट्रिप ची सांगता झाली.
उपसंहार :
भारत का दिल देखो मालिकेतील बस्तर प्रदेशाची सफर आज संपली. खरंतर सुरवात
करताना वाटले नव्हते कि मी १० भागांची मालिका लिहू शकेन. पण तुम्हा
सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व कौतुकाच्या शब्दांनी हे काम मी करू शकले.
भारताच्या हृदयात डोकावून बघण्याचा हा छोटासा प्रयत्न.
इथली भटकंती ठरवताना नाही म्हणलं तरी मनात थोडी भीती होतीच. अतिशय बदनाम असा हा प्रदेश.
कधी वाटायचं कि एखादे वहिवाटीचे, सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ निवडावे आणि करावी
मस्त ट्रिप. आपण तिथे गेलो आणि काही झालं तर? त्यात तीन जेष्ठ महिला आणि एक
लहान मूल बरोबर आहे. काही अघटित घडलं किंवा कोणती मेडिकल emergancy आली तर
कसं? मग विचार केला कि “अघटित घडायचेच असेल तर ते कुठेही घडू शकेल मग आता
का विचार बदला? जो होगा सो देखा जायेगा”.
"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको".
अनंतफंदीं पहिल्याच फटक्यात सांगून गेले आहे. पण बिकट वाटच आवडली असेल तर?
सतत जाऊन जाऊनच ती वहिवाटीची होईल ना...! आणि खरं सांगते या आडवाटा
विलक्षण सुंदर ठरल्या. वाटेवर भेटलेल्या जागा सुंदर, इथली माणसे त्याहून
सुंदर.
भटकंती करताना कुठेही धोका जाणवला नाही. सामान्य जनतेसाठी, पर्यटकांसाठी
एकदम सुरक्षित जागा आहे ही. आपण काळजी मात्र घ्यायची. सरकारी वाहनाने
शक्यतो प्रवास करू नये. आपण सरकारी नोकर असल्यास, मोठ्या हुद्द्यावर
असल्यास ती ओळख सर्वांना सांगत बसू नये. आणि सरकारी धोरणाबद्दल कुठलीही
चांगली वाईट चर्चा करू नये. संभाषणात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, भाजप,
काँग्रेस असे विषय न येऊ देण्याची खबरदारी घ्यायची.
आधी ठरवल्याप्रमाणे बरीचशी ठिकाणे बघता आली. काही हुकली तर काही
अनपेक्षितरित्या गवसली. खर्चाच्या दृष्टीने बघितलं तरी एकदम परवडणारी सहल
झाली. रायपूर - जगदलपूर - रायपूर या एकंदरीत प्रवासखर्च (यात बसचं तिकीट,
एका रात्रीचा हॉटेल स्टे, फिरण्याची गाडी, जेवण, छोटेमोठे पार्किंग फी
वगैरे सगळं धरून) देखील दरडोई रुपये ७५५२ फक्त.
आमच्या भटकंतीचा नकाशा खाली देते आहे. कोणाला जायचं असल्यास कामी येईल. ट्रिपबद्दल काही विचारायच असल्यास तुमचे स्वागत आहे.
जगदलपूर शहर
जगदलपूरला कसे जाल
जवळचे मोठे शहर :
रस्ता मार्गे
रायपूर अंतर ३०२ किमी. via NH ३०
विशाखापट्टणम : ३०० किमी via NH ३०/ NH ६३
रेल्वे मार्गे
रायपूर - विशाखापट्टणम रेल्वे मार्गाने जोडलेले आहे
हवाई मार्गे
विमानतळ : जगदलपूर विमानतळ
रायपूर - जगदलपूर विमानसेवा आहे.
हि लेखमाला प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोलीचे आभार. तसाच वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढला. या सुंदर प्रदेशाबद्दल सामान्यांच्या मनात असलेली भीती या लिखाणाने जरा फिकट झाली तर लेखनाचे सार्थक झाले असे समजेन.
'भारत का दिल' बहुत बडा है जी...
सफरीचे छोटेसे रील
https://youtube.com/shorts/bnKe3w2XZjg?feature=share
Group content visibility:






No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.