Friday, February 9, 2024

नर्मदे हर.

 

लेखांक ५५ : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण , चतुर्मुख महादेव भोला आणि घोघरा

आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही . लहान मुल सतत आईच्या पदराचा काठ धरून चालते पहा तसे काहीसे माझे होते ! मला इथे फार कुणाला भेटण्याची इच्छा नव्हती . म्हणून माईचा काठ धरून चालत राहायचो . आपल्या मनातल्या या सर्व इच्छा नर्मदेला वेळोवेळी कळत असतात . याची अनुभूती मला काही मिनिटातच आली ! कारण आज मी जो मार्ग पकडला होता त्याने कोणीच जात नाही . काही अंतर झाडाझुडपातून चालल्यावर थोडीफार शेती लागली . आणि अचानक एक मोठी नदी समोर आडवी आली . नंतर पार केल्यावर मला कळाले की तिचे नाव इंद्रावती होते . नदी एका सरळ रेषेमध्ये येऊन नर्मदेला काटकोनामध्ये मिळत होती . इथे नर्मदेचे पात्र देखील रुंद खोल आणि धीर गंभीर आहे . या नदीचे पात्र देखील खूप खोल आहे असे वाटत होते . हिच्या पाण्याला खूप गती होती . हा परिसर नक्की कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून या भागाची उपग्रह प्रतिमा सोबत जोडत आहे .
हा आहे नर्मदा इंद्रावती संगम . चित्रामध्ये दिसणारी वाळू देखील त्यावेळी पाण्याखाली होती . म्हणजे पाण्याची पातळी थोडी वाढलेली होती . दोन्ही नद्या खोल आहेत हे नकाशात सुद्धा लक्षात येत आहे . इंद्रावती नदीच्या समोरच्या बाजूला जंगल आहे .
आता मला ही नदी ओलांडणे क्रमप्राप्त होते . मी नदीचा अंदाज घेऊ लागलो . नदी अतिशय खोल होती आणि पाण्याला फार गती होती . पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती . आणि पाणी थोडेसे गढूळ होऊन दृश्यमानता कमी झाली होती .अशा परिस्थितीमध्ये नावे ने नदी ओलांडणे सुद्धा अवघड असते . मी पाहू लागलो की आजूबाजूला कोणी केवट , कोळी ,शेतकरी ,गुराखी किंवा गावकरी दिसतो आहे का .परंतु हा संपूर्ण परिसर अतिशय निर्मनुष्य होता . बहुतेक मला कुठलाही जनसंपर्क नको असे म्हणून मी काठाने चालत असल्याचा हा परिणाम असावा ! नर्मदा मैयाने माझी परीक्षा पाहायचे ठरविले होते ! दहा मिनिटे झाली , पंधरा मिनिटे झाली , वीस मिनिटे झाली .अखेरीस अर्धा तास मी तिथे वेड्यासारखा एकटाच उभा राहिलो ! आता मात्र माझ्या संयमाचा अंत होऊ लागला . इतका वेळ झाला तरी कोणीच तिथे येत नाही हे पाहून मला काय करावे ते सुचेना . अखेरीस मी नर्मदा मातेला म्हणालो , " हे पहा मी तुझ्या काठाने चालणार आहे हे तर निश्चित आहे . तू कितीही संकटे टाक किंवा अडथळे उभे कर . मी तुझा किनारा सोडणार नाही . मला सुरक्षित पुढे नेणे ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे . वेळोवेळी तू माणसे पाठवून मला मार्गदर्शन करते सुद्धा आहेस . परंतु आज तुला काय झालेले आहे माहिती नाही ! " वाचकांनो मी खरोखरीच नर्मदा माते शी असा संवाद करायचो . अगदी वैखरीमध्ये म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचो . कोणाला काय वाटेल ?कोण आपल्याला काय म्हणेल ? याची फिकीर मी एरवी सुद्धा करत नाही , तर तिथे करण्याचा प्रश्नच नव्हता . " मी गेले अर्धा तास इथे उभा आहे . तू मला मार्गदर्शन केलेले नाहीस . आता मी माझे स्वतःचे डोके वापरून ही नदी पार करणार आहे . माझे काय व्हायचे ते होऊ दे . ती आता सर्वस्वी तुझी जबाबदारी राहणार आहे . मला जर काही बरे वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी नर्मदा मातेची असणार आहे ! ऐकून ठेवा रे झाडांनो ! मै आ रहा हू नर्मदा मैया ! " अशी जोरात आरोळी ठोकून मी काठी टेकत-टेकत पुढे सरकू लागलो . वाळूचा एक तीव्र उतार इंद्रावती नदीमध्ये निर्माण झाला होता . खरे तर काठावरील वाळूचा उतार पाहून नदीची खोली सहजपणे काढता येते . परंतु अजून पर्यंत मला इतक्या मोठ्या नद्या फारशा लागल्याच नव्हत्या .त्यामुळे हा अंदाज मला इथे असताना आलेला नव्हता ,हे मान्य करतो . वाळूचा उतार जर तीव्र खोल असेल तर याचा अर्थ नदी खोल असते . आणि अतिशय तिरपा ,कमी कोनाचा उतार आहे म्हणजे ती नदी उथळ असते .  हा उतार साधारण ६० अंश कोनाचा होता . त्यामुळे त्या वाळू ने लगेच तिचा रंग दाखवला . एका क्षणात मी भसकन गुडघाभर खोल पाण्यात गेलो . पाण्याची ओढ आता जाणवू लागली . मी काठीने पुढची जमीन चाचपत होतो .आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत होतो . या नदीमध्ये प्रचंड पाण गवत आणि शेवाळे वाढलेले होते . त्याची पाती पंधरा-वीस फूट पर्यंत लांब होती . ती पायाच्या भोवती वळवळ करत होती . जणू काही साप पायाला विळखा घालतो आहे असे वाटायचे . हळूहळू पुढे सरकताना अखेरीस शेवाळ्याच्या जाळ्यांनी माझे पाय पूर्णपणे जखडून गेले . एक मन सांगत होते अजूनही मागे फिर आणि कोणाची तरी वाट बघ . एखादा नावाडी येईल . तो तुला नावेने पलीकडे सोडेल . परंतु मी जर असे केले असते तर तो नर्मदेवर दाखविलेला अविश्वास ठरला असता . तिला मी एकदा शब्द दिला होता की तुझ्या जीवावर मी आता नदी पार करणार आहे .तर ती पार करणे हे माझे कर्तव्य होते . मला तारायचे का मारायचे हा तिचा प्रश्न होता ! 'द बॉल वॉज इन हर कोर्ट नाऊ ! ' पायाखाली वाळू होती . परंतु ती नदीच्या वेगवान प्रवाहामुळे पुढे पुढे सरकत होती . समुद्रामध्ये जशी पायाखालची वाळू लाटांमळे सरकून जाते तसे काहीसे होत होते . मी साधारण ४० टक्के नदी पार केली असावी . आता पाण्याला प्रचंड ओढ होती . पाणी इतके काळे होते की तळ अजिबात दिसत नव्हता .उलट हलणाऱ्या त्या पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते . नर्मदेचे पाणी इतके शुद्ध आहे की दहा दहा फूट खोल काय आहे ते सुद्धा स्पष्ट दिसते . इथे मला दहा इंचावर देखील काय आहे कळत नव्हते . माझे मन हळूहळू कच खाऊ लागले . आणि माझ्या लक्षात आले की आपला निर्णय चुकला आहे . कारण नदीची खोली अजून वाढतच चालली होती . आणि माझ्या पाठीवर तर झोळी वगैरे सर्व होते . आता मी मुंगीच्या गतीने पावले पुढे सरकवू लागलो . परत फिरता येणे आता अशक्य होते . कारण पायांना शेवाळ्याच्या पानांचे प्रचंड विळखे पडले होते . मी मनामध्ये अचानक काही संकट आले तर काय काय करता येईल याचा विचार करू लागलो . परत फिरता येणे हा एक पर्याय होता .परंतु तो खूप कठीण होता . कारण पाण्याला प्रवाह इतका जबरदस्त होता की ते करताना मी पाण्यामध्ये पडलो असतो . शिवाय वळताना शेवाळ्याने पायाला अजून घट्ट विळखा घातला असता तो वेगळाच . विचार करता करता माझ्या लंगोटीला इंद्रावती नदीच्या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला . आणि माझ्या लक्षात आले की आता माझा पाय खरोखरीच खोलात पडलेला आहे . पोहत पलीकडे जावे हा एक उपाय होता परंतु पाण्याला गती असल्यामुळे ते अवघड होते . पाण्याची गती इतकी जबरदस्त होती की पाण्याने मला थेट नर्मदेमध्ये नेले असते आणि माझी परिक्रमा खंडित झाली असती . शिवाय पाठीवर असलेल्या पिशवीचे ओझे प्रचंड होते . तशी ती पाठीवर ठेवून पोहता येणे अशक्य होते . आता काय करावे असा विचार करत मी तिथे उभा होतो . एक शेवटचा उपाय म्हणून पुढे वाळू किती खोल आहे ते तपासावे असे मी ठरवले . माझे द्विधा अवस्थेमध्ये असलेले मन स्वतःला शिव्या घालू लागले . कुणी सांगितलं होतं नसता द्रविडी प्राणायाम करायला !शांतपणे बसला असतास काठावर तर काय मेला असता का ? आता कोण वाचवणार तुला ? दुसरे मन सांगत होते .गप रे ! नर्मदा मैया आहे ना ! बिनधास्त जायचे ! जे होईल ते होईल ! फार फार तर काय होईल ? नर्मदे मध्ये बुडून मृत्यू येईल ! ह्याच्यासारखी पुण्यदायक घटना अजून काय असू शकते !  मी थोडेसे पुढे वाकून काठी खाली घुसवली ! आणि माझे डोळेच पांढरे झाले ! काठी भसा भसा भसा तीन साडेतीन फूट आत मध्ये गेली ! अगदी सरळ घुसली ! तिला कुठलाही अडथळा नाही ! विरोध नाही !काही नाही ! याचा अर्थ माझ्या पायाखालची कडक वाळू आता संपली होती आणि मऊ शार गाळमाती सुरू झाली होती ! लाखो वर्षे नद्यांनी डोंगराचे कडे घासून गोळा केलेले बारीक मातीचे कण असतात ते ! त्याची बरोबरी जगातली दुसरी कुठलीच माती करू शकत नाही ! या माती इतके सूक्ष्म काहीही नसते ! अचानक माझ्या पायाखालची वाळू ठप्प करून तुटली आणि माझे पाय गुडघाभर खोल गाळात रुतले ! एका क्षणात झालेल्या या प्रकारामुळे मी गांगरून गेलो . माझे पाठीवरील दप्तर सहा इंच पाण्यामध्ये बुडलेले होते . आणि आत मध्ये ठेवलेले सर्व काही भिजू लागले . मी काठीने आधार घ्यायचा प्रयत्न केला . परंतु कुठेही खोचली तरी काठी खोल खोल आत मध्ये जात होती . इकडे माझ्या असे लक्षात आले की हळूहळू मी खाली खाली चाललो आहे . मी एक पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की दुसरा पाय खोल जायचा आणि पुन्हा बाहेर नाही यायचा . इतका तो चिखल पक्का आणि मजबूत होता . अशा ठिकाणी कितीही पट्टीचा पोहणारा मनुष्य असला तरी तो काहीही करू शकत नाही .कारण जर तुम्हाला तुमचे पायच हलवता नाही आले तर काय पोहणार !  आता मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे माझ्या लक्षात आले . मघाशी पायाखाली वाळू होती तोपर्यंत परत उलटे फिरता आले असते . आता माझे दोन्ही पाय गाळात रुतले असल्यामुळे मी पुरता फसलो होतो . हा नदीचा साधारण मध्यभाग असल्यामुळे अतिशय वेगाचा प्रवाह मला उजवीकडे नर्मदे कडे ढकलत होता .सतत ढकलत होता . हातातील काठी काहीच कामाची नव्हती . पाठीवरील दप्तर आता अर्धे भिजले होते . भिजून जड झाल्यामुळे दप्तराने माझे वजन वाढविले होते . आणि त्यामुळे मी अजूनच वेगाने खाली खाली रुतू लागलो होतो . एक क्षणभर असे वाटले की दप्तर प्रवाहामध्ये सोडून द्यावे . काठी सुद्धा सोडून द्यावी . आणि हाताने काही करता येते का पहावे . परंतु दप्तरामध्ये नर्मदा मैया होती . त्यामुळे प्राण गेला असता तरी तिला सोडले नसते . बहुतेक मृत्यू मृत्यू म्हणतात तो आता जवळ आलेला आहे अशी मी मनाची समजूत घालायला सुरुवात केली . कारण पाण्यामध्ये शेवाळे , पाण गवत इतके जास्त होते की काही केल्या मी या जंजाळातून सुटणे अवघड वाटत होते .  त्यामुळे आता काहीही हालचाल न करता शांतपणे उभे राहायचे असे मी ठरवले . हळूहळू थोडे थोडे खचत खचत मी खोल पाण्यामध्ये चाललो होतो . आता पाणी माझ्या छातीपर्यंत आले होते . आणि पाय गुडघ्याच्याही वरपर्यंत खाली गाळामध्ये रुतले होते . हळूहळू पाणी वर सरकत होते आणि मी खाली खचत होतो . कॉम्प्युटरची 'शट डाऊन प्रोसिजर ' असते तशी मी 'प्राणा शट डाऊन प्रोसीजर ' सुरू केली . मृत्यू समयी डोक्यात जो विचार असतो तसा पुढचा जन्म येतो . त्यामुळे अंते मतिः सा गतिः ।  हे डोक्यात ठेवून शेवटी देवाचे स्मरण करावे असे शास्त्रात सांगितले आहे . असा विचार मी करेपर्यंत माझे संपूर्ण दप्तर पाण्यामध्ये बुडले . आणि पाणी गळ्यापर्यंत आले . पाय अजूनच खोल खोल चालले होते . मी काठी समोर खोचून दिली आणि हात जोडले . गजेंद्र मोक्षाची कथा मला मनोमन आठवली . हत्तींचा राजा असाच एकदा पाणी प्यायला जातो आणि एक मगर त्याला खोल दलदलीमध्ये खेचून नेते . आधी स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेला गजेंद्र तिचा खूप प्रतिकार करतो .परंतु जेव्हा तो खोल खोल चिखलामध्ये बुडू लागतो , तेव्हा मात्र समोर उगवलेले एक कमळ सोंडेने खुडून वैकुंठाच्या दिशेला भिरकावतो आणि विष्णूचे स्मरण करतो ! लहानपणी कीर्तनामध्ये कधीतरी ऐकलेली ही कथा बरोबर योग्य वेळी आठवली बर का ! आता माझी अवस्था त्या गजेंद्रहून काही वेगळी नव्हती . फरक फक्त इतकाच होता की मी अजूनही देवाचे स्मरण केलेले नव्हते . मी खाली खचतच होतो . हनुवटीला पाणी लागले . ओठ पाण्यात बुडाले . आता मला या संकटातून वाचवणारे कोणीही दिसत नाही असे वाटत होते आणि आता नाकात पाणी जाणार इतक्यात लक्षात आले की अरे नर्मदा मैया शेजारीच आहे की ! आपण नर्मदे हर तर म्हणालोच नाही ! म्हणून शेवटचा पुकारा करायचा असा विचार करून दोन्ही हात वेगाने आकाशाकडे उंचावले .खांदे पडलेले शरीर ताणून उंच करून ओठ पाण्याबाहेर आणले आणि जोरात ओरडलो नर्मदे s s s s s s हर ! हे म्हणताना सुद्धा इंद्रावती नदीचे थोडेसे पाणी माझ्या तोंडात गेले होते . माझे र अक्षर पूर्ण होत नाही तोपर्यंत समोरच्या काठावर असलेल्या मातीच्या डोंगरावर एक मुलगा मला दिसू लागला ! तो दोन्ही हात उंचावून मला आवाज देत होता ! समोर कोणीतरी मनुष्यप्राणी आहे हे पाहिल्याबरोबर माझी जगण्याची आशा पल्लवीत झाली ! आशा म्हणजे नक्की काय असते हे त्या दिवशी मला कळले ! तो ओरडून मला सांगू लागला , "बाबाजी दाए तरफ सरको ! " उजवीकडे तर नर्मदा होती म्हणजे पाणी अजून खोल असणार होते परंतु तो सांगतो आहे म्हणून मी पाय हलवायचा प्रयत्न केला . तोपर्यंत मी पुन्हा नाका तोंडात पाणी जाईल इतका बुडलो होतो . मी पटकन आधी खोचून सोडून दिलेली माझी काठी हातात घेतली . श्वास थांबवून डोळे पाण्याखाली घातले .  आणि काठीने उजवीकडे चाचपले . तर तिथे वाळू आहे असे माझ्या लक्षात आले . तिथे काठी रोवून मी हळूहळू माझा एक पाय सोडवायला सुरुवात केली . आता काठीचा आधार मिळाल्यामुळे हळूहळू माझा उजवा पाय गाळातून बाहेर निघाला . पायाला विळखा मारलेल्या गवताने आणि शेवाळ्याने खरे तर माझे फार मोठे काम केले होते . पायाला तो विळखा असल्यामुळे मी पटापटा जमिनीमध्ये घुसलो नाही . उजवा पाय अजून उजवीकडे टाकल्याबरोबर मी फुटभर वर आलो आहे असे माझ्या लक्षात आले ! त्या पायावर भार देऊन हळूहळू मी माझ्या डावा पाय सोडवला ! आता मी छाती एवढया पाण्यात उभा होतो ! मी त्या मुलाकडे पाहिले . त्याने ओरडून सांगितले . "अभी तीन कदम सीधे हात की तरफ जाओ . " भाषेचा अभ्यास किती आवश्यक आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल . सिधे हात म्हणजे सरळ जा असा अर्थ नाही . तर या भागात उजव्या हाताला सिधा हात म्हणतात . उजवीकडे खोल संगम आहे हे माहिती असून देखील तो मुलगा आपल्याला तारणार आहे याची खात्री मला असल्यामुळे मी उजवीकडे तीन पावले सरकलो !  आता मी अजून फुट भर वर आलो होतो ! आता खरे तर माघारी वळावे आणि पुन्हा मागचा काठ गाठावा असे मला वाटत होते . परंतु मुलगा वरून ओरडत राहिला . अभी आठ कदम आगे आओ ! हळूहळू आठ पावले मोजून पुढे गेलो तेव्हा लक्षात आले की मी अजून बाहेर आलो आहे ! आता माझ्या भिजलेल्या सॅकमधून प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर गळत होते ! आणि मी पुरेसा बाहेर आलेलो होतो ! अभी पाच कदम बाए हाथ ! त्याचे शब्द ऐकून मी अतिशय शांतपणे आणि विश्वासाने डावीकडे पाच पावले सरकलो . अशा पद्धतीने मार्ग सांगत सुमारे दहा पंधरा मिनिटात त्याने मला संपूर्णपणे नदीच्या बाहेर काढले ! मी बाहेर गेलो , पाठीवरील दप्तर जमिनीवर फेकून दिले ! काठी फेकून दिली ! आणि धावतच जाऊन नर्मदा मातेला जमिनीवर लोटांगण घातले ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे माझे संकट हर ! असा धावा काय केला !आणि क्षणात तिने मला या संकटातून सोडवले होते ! मी विचार करू लागलो की ही धावा करण्याची बुद्धी मला आधी का नाही सुचली !आधी माझा स्वतःच्या तर्कशक्तीवर आणि तोकड्या अनुभवावर अतिशय फाजील असा अति आत्मविश्वास होता ! तो होता तोपर्यंत नर्मदेने मला काहीही सहकार्य केले नाही . आणि एकदाच धावा केल्याबरोबर मला किती सहज तारले !  हे कसे काय शक्य आहे ?कुठून आला तो मुलगा ! ? कोण होता तो ! ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर सांगतो . मी साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेमध्ये पडून राहिलो . इतक्यात तो मुलगा खाली आला . तो अजून कोणालातरी आवाज देत होता असे माझ्या लक्षात आले . त्याच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा असलेला एक मुलगा एका गीर गाईला पकडून तो देखील उतारावरून पळत खाली आला . दोन्ही मुले माझ्यासमोर येऊन उभी राहिली . माझ्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली होती . मृत्यू काय असतो हे जवळून अनुभवायला मिळाले होते . गलित गात्र होणे कशाला म्हणतात आणि आशा पल्लवीत होणे कशाला म्हणतात हे पुस्तकात वाचून खरोखरीच आपल्याला शिकायला मिळत नाही . त्यासाठी असा एखादा नचिकेतानुभव यावा लागतो ! पडल्या पडल्या मी दोघांना माझ्यासमोर बोलवले . आणि दोघांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला . "नर्मदे हर बाबाजी . आपको दंडवत . " असे म्हणून दोघांनी मला नमस्कार केला . मी उठायचा प्रयत्न करत होतो हे पाहून दोघांनी मला उठायला मदत केली .  आता मी उताणा पडलो .  बसण्याची शक्तीच अंगात राहिली नव्हती . मी पडल्या पडल्या त्यांना विचारू लागलो . कोण आहात तुम्ही ?  कुठून आलात ? ही कुठली नदी आहे ? नर्मदे काठची मुले फार हुशार असतात . धाकटा मला म्हणाला . हिंदीमध्ये म्हणाला . मी मराठी मध्ये लिहितो आहे , बाबाजी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो .पण तुमची झोळी भिजलेली आहे . त्यातले सगळे सामान काढून बाहेर ठेवू का ? म्हणजे वाळायला सुरुवात होईल .  चालेल असे म्हणून अनुमोदन दिल्याबरोबर दोघा भावांनी आतील एक एक वस्तू बाहेर काढून घट्ट पिळून पसरून उन्हामध्ये वाळत टाकायला सुरुवात केली . मला पुस्तके जपून ठेवायची सवय आहे . त्यामुळे एकात एक दोन प्लास्टिकच्या पिशव्या घालून मी माझी पुस्तके आणि नर्मदा परिक्रमेचे दिनमान लिहायचो त्या वह्या जलरोधक करून ठेवत असे . त्या पिशव्यांनी त्यांचे काम चोख बजावले होते . आणि किरकोळ ओलावा वगळता माझी सर्व पुस्तके वह्या थोडक्यात वाचली होती .  बाकी नर्मदा मैया आणि पूजा साहित्य मात्र पूर्ण भिजून गेले . परंतु माझ्याकडे एका दुकानदाराने पाटणच्या पुढे एका गावात , तंबाखूचा टीनचा रिकामा डबा दिला होता , त्यामध्ये मी काडीपेटी ,कापूर , फुलवाती ठेवत असल्यामुळे ते मात्र कोरडे राहिले होते .  बाकी प्रत्येक गोष्ट भिजून गेली होती . अंगावरचे कपडे सुद्धा काढून पिळून ठेवा . इथे कोणी बघायला येत नाही . पोरांनी मला सांगितले . आणि मी अंगावरचे वस्त्र देखील काढून पिळून वाळत घातले . सुदैवाने डोक्यावरचा फेटा तेवढा अर्धा कोरडा होता . तो लुंगी सारखा गुंडाळून मी उन्हात बसून राहिलो . 
नक्की काय प्रकार झाला होता हे वाचकांच्या लक्षात यावे म्हणून काढलेले स्मरण चित्र

मुलांची गीर गाय शांतपणे चरत होती . हा आता सांगतो काय झाले ते . छोटा मुलगा सांगू लागला . आम्ही दोघे भाऊ आहोत . शेजारी आमचे गाव आहे भेला नावाचे . ही इंद्रावती नदी आहे . तिच्या काठावर इंद्रदेवाने तप केले म्हणून ही इंद्रावती . या नदीच्या काठावर पुढे थोडेसे जंगल आहे . तिथे आम्ही रोज गुरे चरायला घेऊन येतो . इथून बरोबर एक किलोमीटर अंतरावर आत्ता आमची बाकीची गुरे चरत आहेत . "मग तुम्ही इथे कसे काय आलात ? " मी आश्चर्याने विचारले . अहो बाबाजी काय सांगायचं तुम्हाला ! ही बघा ही आमची गाय ! ही सर्वात शांत गाय आहे . आणि सर्वात म्हातारी सुद्धा आहे . हिला काय झाले काय माहिती ! ही अचानक उधळली आणि इकडे पळत सुटली . आम्ही दोघे हिच्या मागे पळत सुटलो . असा वेडेपणा ती कधीच करत नाही . पण आज तिला काय झाले माहिती नाही ! ती पुढे पळते आहे आणि आम्ही मागे पळतो आहोत !  शेवटी ती इथे संगमावर येऊन थांबली . आता तिला ताब्यात घेणार , इतक्यात नर्मदे हर असा आवाज आला आणि तुम्ही पाण्यामध्ये बुडत असलेले मला दिसले . म्हणून मी ओरडून तुम्हाला रस्ता सांगायला सुरुवात केली . "पण तुला रस्ता कसा काय माहिती ? " वरती उभे राहून बघा ना बाबा ! तिथून नदीचा तळ व्यवस्थित दिसतो आम्हाला . म्हणजे खाली काळे असेल तर गाळ असतो आणि पांढरे दिसते ती वाळू असते . त्याच्यावरून अंदाज लावता येतो . आमच्या गावातले लोक ही नदी अशीच पार करतात . आधी उंचावर उभे राहून रस्ता कुठून आहे पाहून ठेवतात . आणि मग त्याप्रमाणे पावले टाकत नदी पार करतात . तुम्ही मघाशी जिथे बुडत होता तिथे खूप खोल डोह आहे . पण उजवीकडे वाळू आहे हे मला वरून दिसले . अशीच पुढची वाळू कुठे दिसते आहे ते बघून तुम्हाला मी वरून सांगत होतो . मुलगा अतिशय स्वाभाविकपणे हे सर्व मला सांगत होता . त्याचे चातुर्य आणि प्रसंगावधान पाहून मला फार कौतुक वाटले .त्याचे वय सात आठ वर्षाचे असावे . आणि भाऊ दहा वर्षाचा असेल . पाण्यामध्ये उभे राहिल्यावर खरोखरीच खाली काय आहे ते दिसत नाही .कारण तुम्हाला पाण्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत असते . परंतु तिरक्या कोनातून मात्र नदीच्या तळाशी काय आहे याचा अंदाज येतो . माझ्या लक्षात आले की ज्या क्षणी मी नर्मदा मातेला आवाज दिला की मी आता पाण्यात येतो आहे , त्या क्षणी त्या गोमातेला तिकडे कोणीतरी बुद्धी दिली ! की पळ ! कोणीतरी म्हणजे नर्मदा मातेनेच ! तिने स्कॅनर मारून पाहिले असेल की आता सर्वात जवळपास कोण आहे जो याला मदत करू शकतो ? तिला ही दोन मुले सापडली असतील . मुलांना तिने sos सिग्नल देऊन पाहिला असेल ही . परंतु मुले आपापल्या खेळामध्ये मशगुल असतात . त्यामुळे तिने गाईला धावण्याची बुद्धी दिली असे माझे स्पष्ट मत आहे . त्या क्षणी ती गाय तिथे पोहोचली नसती तर आज हा ब्लॉग वाचायची पाळी तुमच्यावर आलीच नसती . सिहोर जिल्ह्यातल्या एखाद्या बुधनी टाईम्स वगैरे स्थानिक वृत्तपत्रातील कोपऱ्यातील चार ओळीच्या बातमीने माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असती . 
इंद्रावती नदीमे एक परिकम्मावासी की मौत ! बास !खेळ खल्लास ! परंतु नर्मदा जागृत आहे . नर्मदा तत्व अतिशय जागृत आहे ! स्वयम कार्यरत आहे ! एक हजार एक टक्के कार्यरत आहे ! नर्मदा माता आहे म्हणून आज मी आहे ! बरेचदा तुम्हाला हा ब्लॉग वाचून असे वाटत असेल की हा मूर्ख मनुष्य सतत मैया ,मैया ,नर्मदा , नर्मदा असे का करतो आहे ? त्याचे कारण हे असे काही अनुभव आहेत !की जे मला तिचा गुलाम बनवतात ! होय तिचा गुलाम बनून राहणे मला प्राणांपेक्षाही प्रिय आहे ! ती आहेच अशी की तिच्यासाठी काहीही करायला कोणीही तयार होईल ! नर्मदे हर !नर्मदे हर !नर्मदे हर !
मुले जायला निघाली . मागच्या गावात मला बिस्कीटचे एक दोन पुडे मिळाले होते ते मी मुलांना दिले . इथे वरती असलेल्या एका पुरातन मंदिराची माहिती मुलांनी मला दिली . आणि तिथे जाऊन विश्रांती घेण्याची सूचना केली . मी छाटी गुंडाळली आणि अर्धे ओले सामान पिशवीमध्ये भरून पुढचा मार्ग पकडला . माझे सर्वांग चिखलाने माखलेले होते . अवतार बघता क्षणीच कोणीही सांगावे की हा माणूस आता कुठल्यातरी संकटातून बाहेर आला आहे अशी माझी अवस्था होती . थोडेसे चालल्याबरोबर डावीकडे छोट्या पायऱ्या दिसल्या . हे भेला नावाचे गाव होते आणि चतुर्मुख महादेवाचे पुरातन असे मंदिर वरती होते . 
चतुर्मुख महादेव मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या
.
डावीकडे छोटासा आश्रम आणि शेजारी चतुर्मुख महादेव मंदिर .
गेल्या गेल्या मी या गोल पायऱ्यांवर ऊन खात बसलो . 
तत्पूर्वी शेजारी असलेल्या दुसऱ्या आश्रमाच्या हद्दीतील या सार्वजनिक नळावर मी हात पाय तोंड स्वच्छ धुतले .
हातपाय धुवून मंदिराच्या पायरीवर जाऊन बसलो . इतक्यात शेजारी राहणाऱ्या कुटीतून ममता गिरी नावाच्या अतिशय तेजस्वी साध्वी बाहेर आल्या . यांचे वडील कैलासवासी प्रेमभारतीजी यांनी ही कुटी बांधली होती . त्यांनी माझी विचारपूस केली . मी नर्मदे कडून घाट चढून वर आलो आहे हे सांगितल्यावर त्यांचा विश्वासच बसेना . त्या म्हणाल्या की त्या बाजूने तर रस्ताच नाही मग तुम्ही कसे काय आले ? मग मी त्यांना खाली घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला . मी अजूनही त्या प्रसंगाच्या धक्क्यातून पुरता सावरलेला नव्हतो . त्या मला म्हणाल्या की या नदीला चालत पार करून आलेला तू पहिला परिक्रमावासी आहेस . निदान मी इथे आहे तेव्हापासून तरी कोणी या मार्गाने आलेले पाहिलेले नाही . मी नर्मदा मातेला त्रास दिला त्याबद्दल मला अजूनच वाईट वाटले . तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊन या तोपर्यंत मी चहा बनवते असे ममता गिरींनी सांगितले . ममता गिरी यांच्या अंगावरील वस्त्र फाटलेले होते हे त्या मागे वळल्यावर माझ्या लक्षात आले . केवळ नर्मदे काठी असलेले एक पवित्र स्थान आणि त्याचे पावित्र्य जपले जावे , तसेच आपल्या वडिलांची परंपरा टिकावी म्हणून आजन्म ब्रह्मचारी राहून तिथे असे आयुष्य जगणाऱ्या ममता गिरी या किती श्रेष्ठ साध्वी असतील याचा विचार फक्त करून पहा ! आताच्या काळामध्ये दर महिन्याला नव नवीन उंची साड्या आणि वस्त्रप्रावरणे विनाकारण विकत घेणाऱ्या माता-भगिनींना हा त्याग कळणे कदापि शक्य नाही हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते . या मंदिरातील शिवलिंग खाली खोल खड्ड्यामध्ये होते . अतिशय तुळतुळीत अशा काळ्याभोर पाषाणाचे चार मुखे असलेले हे दुर्मिळ शिवलिंग होते . शिवलिंग फारच शक्तिशाली आहे असे मला दर्शन घेताना जाणवले . साध्वी कोरा चहा घेऊन आल्या आणि मला त्या शिवलिंगाची माहिती सांगू लागल्या . नेपाळमध्ये पशुपतिनाथाची स्थापना ज्या क्षणी झाली , त्याचवेळी त्या पशुपतीनाथाच्या शिवलिंगाची हुबेहूब प्रतिकृती म्हणून हे शिवलिंग तयार करण्यात आले होते . आणि दोन्ही शिवलिंगांचा पाषाण हा काळी गंडकी नदीतील शालिग्राम आहे . ज्या क्षणी तिकडे पशुपतिनाथ स्थापन झाले त्याच वेळी इकडे भेला गावात , ज्याचे त्या काळातील नाव भोला असे होते , त्या भोला गावामध्ये हे शिवलिंग स्थापन झाले . 

२२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती स्थापन झाल्यावर अन्य दोन रामाच्या मूर्ती अन्यत्र स्थापन झाल्या तसेच काहीसे हे असावे .  त्यामुळे ज्याला पशुपती नाथाला जायला जमत नाही ती माणसे इथे दर्शन घेतात . माझे पशुपतिनाथाचे दर्शन झालेले नाही त्यामुळे मला आनंद झाला ! इंद्राची ही तपोभूमी खरोखरीच पवित्र होती . ममता गिरी मला म्हणाल्या की तुम्हाला जर मुक्काम करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता . फक्त तुम्हाला मंदिरात उघड्यावर झोपावे लागेल . कारण कुटीमध्ये मी एकटीच असते . गावातील विघ्न संतोषी लोकांनी त्यावरून काही अपप्रचार करायला नको . मी त्यांना म्हणालो की मला या स्थानावर राहायला नक्की आवडले असते . परंतु अजून थोडासा दिवस शिल्लक आहे . तर चालून घेतो . आपले खूप खूप आभार ! त्या तपस्विनी साध्वीला मनापासून दंडवत नमस्कार केला आणि पुढे निघालो . घोघरा गावामध्ये नर्मदेचे पात्र इतके विस्तीर्ण होते की बास ! सुमारे तीन किलोमीटर तरी त्याची रुंदी होते ! मध्ये एक भव्य बेट व दोन्ही बाजूने खळाळत वाहणारी माताराणी ! अतिशय विहंगम असे दृश्य आहे ! नुकत्याच पडलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल माजला होता .शेतातील गहू निघण्यापूर्वी थोडे पाणी घालतात . त्यामुळे त्याचा शेवटचा चिखल देखील सर्वत्र होता . त्यामुळे शेत सोडून अगदी मैयाच्या काठाने चालायला सुरुवात केली . म्हणजे काठी पाण्यामध्ये बुडवत चाललो . वयाच्या पातळीवरील शेती सोडून वरती देखील एका पातळीवर खूप शेती होती आणि तिथून मोठा रस्ता होता जो घोघरा गावात जायचा . वरून बरेच परिक्रमावासी चाललेले मला दिसत होते . त्याच्यातील एक तरुण मुलगा वरून खाली उतरला आणि नर्मदा मातेचे फोटो काढता काढता त्याने माझा देखील एक फोटो काढला . पुढे आश्रमात गेल्यावर या मुलाशी खूप चांगली ओळख झाली .याचे नाव देवेंद्र प्रभाकर सारंग परंतु तो त्याचे नाव सारंग देव असे सांगायचा . हा मुंबईला प्रभादेवीला राहत होता . 
घोघरा गावानजीक नर्मदेच्या काठावरील मार्गाने चालताना प्रस्तुत लेखक. पायामध्ये पाचवा बूट घातलेला आहे .
प्रभादेवी मुंबई येथील परिक्रमावासी सारंग देव यांनी काढलेले प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र . या पातळीच्या लगेच वर चिखल भरलेली शेती आहे . त्याच्यावर सुमारे तीस फुटावर जमिनीची पातळी चालू होते जिथून रुळलेला परिक्रमा मार्ग आहे .
परंतु मला सतत नर्मदेच्या काठावरील हे रस्ते खुणवायचे . इथे तिचा प्रत्यक्ष सहवास लाभतो .
इथून एका उंच टेकाडावर सुंदर असा हा आश्रम होता . आश्रमामध्ये एक मोठा झाडाचा पार होता . दोन झोपड्या होत्या . अंगणामध्ये मधोमध झाडांची एक रेष लावून अंगणाचे दोन भाग केले होते . एका बाजूला स्वतः स्वयंपाक करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला बसून खायचे अशी व्यवस्था होती . 
घोघरा येथील नर्मदा घाट
इथे पाणी उथळ असल्यामुळे पात्र विस्तृत होते .मध्ये एक खूप मोठे बेट आहे पलीकडे पुन्हा नर्मदा आहे .
 घोघरा गावा समोर दिसणारे बेट
स्वच्छ सुंदर नर्मदा जल
याच उतारावरून सारंगदेव खाली उतरला आणि माझा फोटो काढला
मध्ये येऊन मिळणारे ओढे नाले
आश्रमाकडे जाणारी शेतातली वाट
आश्रमातील पिंपळाचा पार
 घोघरा आश्रमातील निवास व्यवस्था . सुरेख सारवलेले अंगण दिसते आहे .डाव्या बाजूला झाडांच्या रेषेच्या पलीकडे आम्ही उघड्यावरच स्वयंपाक केला . आश्रम छोटासाच परंतु स्वच्छ सुंदर आणि पवित्र आहे .
इथे एक जोडपे शिधा देण्याचे काम करण्याकरता ठेवले होते . मी इथे गेलो तेव्हा आधीच बरेच परिक्रमा वासी येऊन थांबलेले दिसले . मी आल्यावर देखील काही जथे आले आणि एकूण परिक्रमा वाशींची संख्या सुमारे २५ ते ३० झाली . प्रत्येक जण आपापल्या गटानुसार वेगळा वेगळा शिधा घेऊन स्वयंपाक करायला लागला होता . हीच सर्वांना एकत्र करण्याची संधी आहे हे ओळखून मी सर्वांना आवाहन केले की आपण सर्वांनी वेगळा वेगळा स्वयंपाक करून अधिक अन्न वाया जाण्याची शक्यता आहे . शिवाय प्रत्येकाला स्वयंपाक करावा लागेल . त्यापेक्षा सर्वांचा स्वयंपाक एकत्रच कोणीतरी दोघा तिघांनी केला तर कसे राहील ?  कल्पना तर चांगली होती परंतु पुढाकार कोणी घेईना . अखेरीस मी जाहीर केले की सर्वांच्या पोळ्या मी बनवेन .कोणीतरी भाजीची जबाबदारी घ्यावी . पुण्याचे एक काका तिथे आले होते त्यांनी भाजी बनवण्याची जबाबदारी घेतली . नंतर मला कळाले की त्यांना स्वयंपाक येतच नव्हता .परंतु कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून त्यांनी मी भाजी बनवतो असे म्हटले होते ! याला म्हणायचे मॅनेजर !मी सुमारे १३० जाडजूड मोठ्या पोळ्यांची कणिक एकट्याने मळली ! बहुतांश परिक्रमावासी वयोवृद्ध असल्यामुळे सर्वांनाच आराम आणि विश्रांती मिळाली त्याचे मला समाधान होते . इथे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले श्री औंधकर म्हणून एक होते व त्यांची विशाखा नावाची बहिण परिक्रमेमध्ये होती . मी एकट्याने शंभर एक पोळ्या केलेल्या होत्याच . काही वेळाने विशाखा ताई माझ्या मदतीला आल्या आणि शेवटच्या काही पोळ्या त्यांनी लाटल्या . मी भाजल्या . मी केलेल्या पोळ्या आणि त्यांच्या पोळ्या याच्यामध्ये जमीन आस्मानाचा फरक होता ! त्यांच्या पोळ्या गोल गरगरीत आणि अतिशय मऊसूत होत्या . नर्मदा परिक्रमेमुळे मला स्वयंपाकाची खूप आवड निर्माण झाली हे मात्र खरे. हळूहळू एक एक जण मदतीला येऊ लागले आणि बघता बघता पिठलं भात देखील तयार झाला ! सर्वांना अंगणामध्ये मस्तपैकी जेवायला वाढले ! त्या दिवशीचे भोजन सर्वांनाच खूप आवडले ! सुमन तोपर्यंत पारावर बसून गाणी म्हणत राहिला आणि लोकांचे मनोरंजन करत राहिला . पहाटे लवकर उठून आश्रम सोडला . जिथे पात्र विस्तृत होते आणि पाणी खळखळत वाहते तिथे धुके निर्माण होते हे आपण मागे पाहिले ! आजवरचे सर्वात घनदाट धुके अनुभवत नर्मदेचा काठ पकडला !अक्षरशः एका पावलापूर्ती जमीन दिसत होती ! केवळ नर्मदा मातेचा रव अर्थात आवाज ऐकत चालावे लागत होते . रव या शब्दातूनच रेवा या नावाची निर्मिती झालेली आहे . नर्मदा मातेला रेवा का म्हणतात ते आज खऱ्या अर्थाने कळाले ! रेवा मैया की जय ! 
याच्यापुढे एक चित्त थरारक प्रवास मी केला . त्याचे वर्णन पुढच्या लेखात पाहू . नर्मदे हर !


लेखांक पंचावन्न समाप्त (क्रमशः )

लेखांक ५६ : पथाडा चा घातक पथ , बाबरी मध्ये भजन आणि चंद्राची तपोभूमि , चांदगढची चांदला कुटी

घोघरा सोडल्यावर आयपा घाट लागतो . अतिशय सुंदर असा हा घाट आहे . इथून पुढे पठाडा किंवा पठारा गाव लागते . सर्व लोक रस्त्याने जात होते परंतु मी उद्याच्या किनारा पकडून ठेवला . या भागामध्ये अतिशय सुंदर अशी शिवलिंगे नर्मदे किनारी सापडतात . दरवर्षीच्या महापुरामध्ये नवीन नवीन शिवलिंगे इथे येऊन साचत असतात . ही सर्व शिवलिंग पाहत जाताना पुढे इकडे काठावर चा रस्ता संपला आहे असे लक्षात आले . इथे नर्मदा दोन शाखांमध्ये विभागते आणि मधोमध प्रचंड वाळूचा साठा असलेले एक बेट तयार झालेले आहे . या बेटावर नावेने स्थानिक लोक आणि पर्यटक जातात .
 .आता हळूहळू प्रवासी नावा दिसू लागल्या होत्या . आकाराने मोठ्या असलेल्या आणि एक वेळी अनेक लोक व दुचाकी नेऊ शकणाऱ्या गोव्यातील फेरीबोट सारख्या छोट्या नावा या भागात दिसल्या . 
या भागातील छोट्या फेरी बोट
वीस रुपये आकारून प्रवाशांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेले जाते . (संग्रहित छायाचित्र )
 आयपा घाटावर नर्मदा उथळ आहे . स्नान देखील करता येत नाही इतकी उथळ आहे .
सर्वत्र दगड गोट्यांचा खच आढळतो . यात सुंदर शिवलिंगे सापडतात . समोर दिसणारा वाळूचा किनारा म्हणजे मध्ये तयार झालेले बेट आहे .
पाणी अतिशय शुद्ध व स्वच्छ आहे
हेच ते वाळूचे बेट ज्याच्यामुळे नर्मदा मैया दोन शाखांमध्ये विभागली जाते ( संग्रहित छायाचित्र )
बेटाचे विहंगम दृश्य (संग्रहित ड्रोन शॉट )
समोर उभा कडा दिसू लागला ,ज्याची नर्मदेमध्ये सावली पडली आहे पहा . त्याच्यामुळे मी किनारा सोडून ओढ्याच्या वाटेने वरती आलो आणि समोर असलेल्या नर्मदा सेवा आश्रमात पोहोचलो .
भरतसिंहजी आणि लीलाबाई या दाम्पत्याने पथाडा गावामध्ये हा आश्रम सुरू केलेला आहे .आळंदी मधील संत सेवा आश्रम देखील या आश्रमाशी संलग्न आहे .

इथे आधीच काही परिक्रमावासी येऊन बसले होते ज्याच्यामध्ये एकनाथराव रोकडे आणि शेळके काका वगैरे होते . ते सर्वजण सडक मार्गाने चालायचे आणि मी काठाने चालायचो . ते खूप अंतर चालून साधारण मला जितका वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये आश्रमामध्ये पोहोचायचे . असे पुढे बरेच वेळा झाले . याच्यावरून माझ्या असे लक्षात आले की काठावरून चालले किंवा सडक रस्त्याने चालले तरी वेळ साधारण तेवढाच लागतो . फक्त काठावरून चालताना नर्मदा मातेचा अखंड सहवास मिळतो . आज चालताना मला बोटाच्या आकाराचे अतिशय सुंदर आणि सुबक असे शिवलिंग सापडले . त्या शिवलिंगाला तोडच नव्हती ! त्याचा रंग देखील कातडीसारखा होता . ते मी सर्वांना दाखवले असता शेळके आणि रोकडे यांच्यासोबत असलेले तिसरे एक मराठी काका परिक्रमावासी होते . जे खूप चांगले होते , परंतु त्यांचे नाव मी दुर्दैवाने विसरलो . तर त्यांनी ते मला मागितले आणि मी त्यांना ते देऊन टाकले . आता आमरण मी या शिवलिंगाची पूजा करेन असे त्यांनी मला सांगितले . हा आश्रम म्हणजे एक छोटीशी झोपडी होती . दुतर्फा शेती असलेल्या एका छोट्या डांबरी रस्त्याच्या कडेला ही झोपडी बांधण्यात आली होती .
 पथाडा आश्रम
इथून पुढे बाबरी नावाचे गाव लागते .या गावाचे नामकरण नर्मदापुरम सोबतच श्री रेवापुरम असे करण्यात आलेले आहे . या गावातील बाबरी या शब्दाचा बाबर या बादशाहशी काही संबंध नसून बोरुचे टाक पूर्वी मिळायचे , त्याचे जे गवत नर्मदे काठी उगवते ,त्या गवताला या भागामध्ये बाबरी असे म्हणतात . ते गवत इकडे विपुल उगवते म्हणून या गावाचे नाव बाबरी पडले असे मला गावात ग्रामस्थांनी सांगितले . ते काही का असेना श्रीरेवापुरम हे नाव कधीही अधिक चांगले आहे ! 
इथे मला काही केल्या किनाऱ्याने जायचे असे डोक्यात होते . त्यामुळे मी शेतामध्ये घुसलो . या भागामध्ये हरभरा खूप लावला होता . त्याला पाणी घालणारे तुषार सिंचन अखंडितपणे सुरू होते . 
पथारा मधील तुषार सिंचन करणारी  शेते

आज पठारा ते बाबरी हा अति कठीण मार्ग पार होणार होता याची मला देखील कल्पना नव्हती . मी शेतातून जाताना मला पुढे एक आश्रम दिसला म्हणून त्या आश्रमामध्ये गेलो . आळंदी येथील काही वारकरी संतांनी मोठ्या प्रेमाने , एक एकर जागा विकत घेऊन हा आश्रम उभा केला आहे . इथे असलेले महाराज निवृत्त शिक्षक होते आणि आता पूर्णवेळ आश्रम चालवण्याचे काम करत होते . यांनी मला उन्हामध्ये बसण्यासाठी चटई दिली आणि भरपूर हरभरा माझ्या पुढे आणून टाकला ! हरभरा खताखता आम्ही गप्पा मारू लागलो . मराठी बोलणारी माणसे भेटली की बरे वाटायचे . मी महाराजांना विचारले की इथून पुढे काठाने जाणारा रस्ता आहे का ? 
हाच तो मा नर्मदा संत सेवा आश्रम .
नर्मदे काठी आश्रम उभा करताना एक ठराविक पठडी दिसते . एखादा स्थानिक मनुष्य पकडला जातो .त्याच्या मदतीने आश्रमाचे संचालन होते  .त्यानंतर एखादा प्रेरक किंवा संस्थापक असतो आणि एखादा कार्यवाह असतो .शिवाय अशा संस्थापकांनी आपल्या भक्तमंडळींना आणि शिष्य संप्रदायांना प्रेरणा देऊन देणग्या गोळा केलेल्या असतात . त्याच्या साह्याने आश्रमाचे कामकाज चालते . काही स्वयंभू आश्रम देखील दिसतात . हा आश्रम स्वयंभू होता . म्हणजे निवृत्त शिक्षक असलेल्या कीर्तनकार महाराजांनी त्यांची सर्व जमापुंजी लावून आश्रम उभा केला होता . "तुम्हाला सडकेने गेलेले चालणार नाही का ? " महाराजांनी मला विचारले ? " खरं सांगायचं तर नाही चालणार . मला काठाने नव्हे नव्हे काठानेच चालायचे आहे !" माझा हा निश्चय ऐकून महाराज मला म्हणाले , " इथून आजवर एकच महात्मा गेल्याचे मी ऐकलेले आहे .याचा अर्थ मार्ग निश्चितपणे आहे .फक्त कोणी जात नाही त्यामुळे काळजी घ्या . मैय्या सोबत आहेच " असे शिक्षक आम्हाला हवे होते असे मी त्यांना बोलून दाखवले ! धडपडण्याची इच्छा असलेल्या मुलांना जे हवे ते करू देणे ,फक्त दुरून त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे एका आदर्श शिक्षकाचे काम असते .
आश्रमातून दिसणारे भव्य वाळूचे बेट आणि नर्मदा मातेची डावी शाखा
 महाराजांनी होकार दिल्याबरोबर मी सामान उचलले . सरळ निघालो होतो परंतु त्यांनी मला एक जबरदस्त मार्ग बघून तेथूनच जाण्यास सांगितले . आश्रमाच्या अलीकडे एक ओढा होता .जो कोरडा पडलेला असे . परंतु त्या ओढ्याच्या वाहण्यामुळे तयार झालेले जे भुयार होते ते अक्षरशः पांडवांनी तयार केलेल्या लाक्षागृहातील भुयाराची आठवण करून देईल असे होते ! अतिशय लांब ,भीतीदायक ,भयानक परंतु तेवढेच गुढरम्य होते . त्यातून वेगाने चालताना कधी ती "सांदण दरी " तुम्हाला मैय्या पाशी आणून सोडते याचा अंदाजच येत नाही !इथे आलो आणि अक्षरशः मला एखाद्या भयपटामध्ये दाखवतात तशा भूभागामध्ये आल्यासारखे वाटू लागले ! प्रचंड वेगाने नर्मदा जल वाहत होते . डावीकडे अतिशय खडकाळ , उंच ,धोकादायक आणि असमान असा निसरडा कडा होता . लाखो करोडो विविधरंगी शिवलिंगे वाळूमध्ये मिसळून त्याचे खडकात रुपांतर झालेला हा भूगोल होता . इथून अनवाणी चालता येणे अशक्य होते इतके हे दगड टोकदार आणि कठीण होते . ९० अंशापेक्षा पेक्षा थोडासा अधिक कोन असावा इतका तो उतार धोकादायक होता .  इथून चालताना जरा जरी दुर्लक्ष झाले की तुम्ही खूप सार्‍या दगडांवर आपटत अखेरीस नर्मदार्पण होणार असा हा मार्ग होता . मठपती म्हणाले ते खरे होते इथून कोणी जाण्याची शक्यताच नाही कारण हा मार्ग खरोखरच खूप कठीण होता . मी या मार्गाचे काही फोटो कुठे मिळतात का ते गुगल नकाशावर शोधत होतो . सुदैवाने समोरील बेटावरून कोणीतरी एका मुलाचा या मार्गावरून जाताना चा फोटो काढलेला आहे तो इथे जोडतो ज्यामुळे तुम्हाला मार्गाची कल्पना येईल .
हाच तो पठाडा ते बाबरी कठीण , खडकाळ ,उभा सरळसोट कडा असलेला  परिक्रमा मार्ग ! कृपया या मार्गाचा अवलंब परिक्रमावासिनी करू नये अशी हात जोडून विनंती आहे ! मैय्याला त्रास सोसावा लागतो ! हा मुलगा ज्या पद्धतीने चालला आहे त्या पद्धतीने हा मार्ग साधारण अडीच तीन किलोमीटर आहे ! कल्पना करून पहा ! 
ही जी उभी भिंत आहे त्यामध्ये लाखो करोडो वर्षांपूर्वी गाळामध्ये रुतून बसलेली अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशी शिवलिंगे मिळतात . ती काढता येणे मात्र कठीण असते कारण ती काढण्यासाठी शक्ती लावायला जावे आणि तुमचा पाय सुटून तुम्ही थेट नर्मदार्पण व्हावे अशी शक्यता खूप असते ! या मार्गावर तरस कोल्हे घुबडे यांनी मला दर्शन दिले ! जो काही पाय मार्ग निर्माण झाला आहे तो याच प्राण्यांनी निर्माण केला आहे असे नंतर माझ्या लक्षात आले . मला पाहून एक तरस लांब वर पळून जाताना दिसले .  थोड्या वेळाने मागे दगड पडल्याचा आवाज आला म्हणून पाहिले असता कोल्ह्याची जोडी पळताना दिसली . याचा अर्थ मी त्यांच्या जवळून जाताना ते निस्तब्ध कुठेतरी उभे राहिले होते आणि सात्मीकरण अथवा कॅमाफ्लज झाल्यामुळे ते मला दिसलेच नाहीत !  अजून थोड्या वेळाने एक खूप मोठे घुबड माझ्या शेजारून उडत गेले ! त्याच्या पिवळ्या धमक पंखांचा विस्तार पाहून मी अचंबित झालो ! याचा रंग हुबेहूब तिथल्या दगड मातीशी जुळणारा होता त्यामुळे ते कुठे जाऊन बसले हे नंतर मला सापडले सुद्धा नाही ! या संपूर्ण मार्गावरती कोणी भेटण्याची शक्यता नव्हतीच . इतक्यात एक डोंगा घेऊन निघालेला मनुष्य मला आवाज देऊ लागला . मी त्याला नर्मदे हर केले . त्याने नावेतूनच माझ्या दिशेला साष्टांग दंडवत घातला . आणि म्हणाला या मार्गाने चाललेला पहिला परिक्रमावासी मी पाहत आहे . तुमचा एक फोटो काढतो असे म्हणून त्याने जिओच्या साध्या फोनवर माझे फोटो काढले . त्याला मी मित्राचा क्रमांक देऊन ठेवला . परंतु पुढे त्याने तो फोटो पाठविला की नाही हे कळायची काही सोय राहिली नाही . परंतु हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता हे मात्र अगदी शंभर टक्के खरे आहे ! नर्मदेचा काठ असा देखील असू शकतो याची कोणी कल्पना देखील करू शकणार नाही ! संपूर्ण दोन अडीच किलोमीटर अंतरामध्ये एकही झाड किंवा गवताचे पाते देखील उगवलेले नाही . आणि पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे चालताना फार मोठी कसरत करावी लागते . या रस्त्याने चांगलाच घाम काढला ! परंतु प्रत्येक पावलाला नर्मदा मातीचे स्मरण करत चाललो होतो त्यामुळे प्रवास सुकर झाला ! याच्या विरुद्ध समोरचे बेट मात्र अतिशय विस्तीर्ण आणि निवांत अशा वाळूने भरलेले होते ! मध्ये वाहणारे नर्मदेचे पात्र हे मात्र तिला दोन्ही बाजूंची फिकीर नसल्यासारखे प्रचंड वेगाने पुढे झेपावत होते . हा मार्ग संपल्या बरोबर मोठे मोठे खडक दिसू लागले . इथे नर्मदा एक मोठे दक्षिणमुखी वळण घेते . या वळणावर वरच्या टेकड्यावरून एका शेतकऱ्याने मला पाहिले आणि तो वेडाच झाला ! इथून कुठून आला वगैरे त्याने मला विचारले . मी संपूर्ण रस्ता चालत आलो आहे यावर त्यांचा विश्वासच बसेना .त्याला असे वाटले की मी इथून मागे जाऊन रस्ता नाही असे बघून परत माघारी आलो आहे . इथे ग्रामस्थ देखील अजिबात जात नाहीत हे त्यांनी मला सांगितले . स्वाभाविक आहे वरील मुलाचे चित्र पहा त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की इथे तुम्हाला वर किंवा खाली जायची सोयच नाही .केवळ पुढे पुढे जात राहायचे आहे !  कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे सुद्धा वळता येत नाही . कारण एक पाय ठेवता येईल एवढीच जागा आहे .त्यात देखील पाठीवर मोठा बोजा असेल तर अजून कठीण होते . या भागामध्ये मी अतिशय दुर्मिळ आणि सुंदर अशी खूप शिवलिंगे गोळा केली ! परिक्रमेतून आल्या आल्या ती जो प्रथम भेटेल त्याला प्रथम या न्यायाने वाटून टाकली . पुढे मोठे मोठे खडक पार केल्यावर मैयाचा विस्तीर्ण वाळू किनारा लागला ! हा किनारा इतका भव्य इतका सुंदर आणि इतका लांबलचक होता की विचारूच नका ! माझ्या अंदाजाने नर्मदे किनारी सलग लांबीचा वाळूचा हा सर्वात मोठा पट्टा असावा ! मुळात मध्ये साठलेल्या बेटावरच किती सुंदर वाळू आहे हे देखील आपण उपग्रह नकाशाद्वारे पाहू शकतो . चंद्रकोरीचा किंवा पाण्यात विहार करणाऱ्या नौकेचा आकार असलेली बेटाची रचना आहे .
आश्रमातून निघाल्यावर मी ज्या लाक्षागृहमार्गाचे वर्णन केले तो मार्ग व पुढे काठावरचा कठीण मार्ग दाखविणारा बाण . समोर दिसणारा विस्तीर्ण वाळूचा किनारा . मध्ये तुफान गतीने वाहणारी अतिखोल नर्मदा ! जय हो माईकी ! चिंता काहेकी !
 नौकेच्या आकारातील वाळूचे बेट .डाव्या किनाऱ्यावरचा शेतांच्या खाली आणि मैया च्या शेजारी दिसणारा , गोलाकार अंधारा मार्ग म्हणजे पठाडाचा घातक पथ !
तोच मार्ग थोडा अजून जवळून पहा . कृपया लाल मार्कर कडे दुर्लक्ष करणे . आपला मार्ग जवळपास नर्मदेच्या पातळीवरून आहे .
या वळणानंतर सरळ रेषेत वाळूच वाळू !
या वाळू मार्गाने कोणीही परिक्रमावासी जात नाहीत कारण चालता येणे खूप अवघड असते . वाळूमुळे नर्मदेला येऊन मिळणाऱ्या नद्या देखील तिला किती उशिरा भेटतात ते तुम्हाला या नकाशातून लक्षात येईल . आणि ही नदी पार करणे किती कठीण आहे ते देखील चित्रावरून तुमच्या लक्षात येईल ! एखादे लांबलचक हाडूक ठेवल्याप्रमाणे हा आकार दिसतो .
या वाळूच्या काठावर मी पोहोचलो आणि माझे स्वागत केले ते दोन बंगाली मित्रांनी ! सात्यकी राय आणि सुमन मुजुमदार आधीच या गावांमध्ये पोहोचून नर्मदे काठी येऊन गाणी म्हणत बसले होते ! मला पाहताच दोघांना खूप आनंद झाला . या दोघांना पोहायला येत नव्हते त्यामुळे ते स्नान करताना थोडेसे जपून असायचे . परंतु इथे स्नान करण्यासाठी योग्य जागा आहे असे पाहून मी स्नान करू लागलो . सर्वत्र वाळूच वाळू होती आणि काही ठिकाणी वाळू उपसणाऱ्या नावा जाण्यासाठी खोल खड्डे तयार केले होते . अशा एका खोल खड्ड्यांमध्ये मी स्नान करू लागलो . नर्मदेमध्ये पोहायला परिक्रमा वासींना परवानगी नसते . त्याच्या मागचा भावार्थ असा आहे की पोहोताना आपण नदीला लाथा मारतो त्या तिला लागू नयेत म्हणून परिक्रमावासीने पोहायचे नसते . परंतु मला पाण्यामध्ये कुठलीही हालचाल न करता पद्मासन घालून तासंतास झोपता येते . त्यामुळे त्या प्रकारे मी बऱ्याच ठिकाणी स्नान करत असे .मी पाण्यावर झोपलो आहे हे या दोघांना पटत नव्हते .ते मला म्हणायचे की तुझ्या अंगाखाली वाळू आहे त्याच्यावर तू बूड टेकलेले आहेस ! मी सांगून देखील त्यांचा विश्वास बसत नव्हता .बर अशा पद्धतीने पाण्यावर पडलेले असताना श्वास देखील चालू राहतो आणि बोलता देखील येते त्यामुळे त्यांना अजूनच खोटे वाटत होते. त्यामुळे त्या दोघांचा विचार सोडून मी नर्मदाष्टक सुरू केले .
बाबरी घाटावर अर्थात श्रीरेवापुरम येथे सात्यकी रॉय याने घेतलेला प्रस्तुत लेखकाचा नर्मदा स्नान करतानाचा फोटो . इथे पाणी खोल आहे . 
 नर्मदाष्टक म्हणत असा मी निवांत झोपलेलो असताना माझ्या शेजारून वाळू उपसणाऱ्या लोकांना घेऊन जाणारी एक मोटर बोट गेली . किमान दहा पंधरा फूट खोल पाणी असल्याशिवाय अशा बोटी चालवता येत नाहीत . हे पाहिल्यावर मात्र या दोघांची खात्री पटली की पाणी खोल आहे . वाळू उपसणारे कामगार मात्र नर्मदे हर काही केल्या म्हणत नव्हते . केवळ पोट भरण्यासाठी परप्रांतातून आलेले हे लोक असतात .यांना नर्मदेचे फारसे काही देणे घेणे नसते . या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सात्यकी रॉय घेत होता व नंतर त्याचे फेसबुक अकाउंट वर त्याने हे सर्व व्हीडीओ टाकले . आपल्या माहितीकरता तो व्हिडिओ सोबत जोडत आहे . 

यानंतर सुमन आणि मी चालत फिरत नावेवर बसून बंगाली गाणी म्हणू लागलो . त्याचे देखील व्हिडिओ सात्यकी ने बनवले . दोघा बंगाली मित्रांच्या आग्रहाखातर त्या व्हिडिओमध्ये मी सामील झालो .नाहीतर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेण्याची माझी इच्छा नव्हती . परंतु एक अनमोल ठेवा म्हणून हे व्हिडिओ आपण घेऊन ठेऊ असे दोघे म्हणाले . ते व्हिडिओ देखील आपल्या माहिती करता सोबत जोडत आहे .




हे सर्व व्हिडिओ पाहून काही लोकांचा संताप होण्याची शक्यता आहे . कारण त्यांच्या मते परिक्रमेमध्ये नर्मदा मातेला पायाने स्पर्श देखील करायचा नसतो . परंतु या बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे होते आणि आहे . आपण नर्मदेला माता मानले आहे म्हणजे ती आपली आई आहे . मी तिचे मूल आहे . एकदा ही भूमिका प्रस्थापित झाल्यावर मूल आईच्या मांडीवर खेळते बागडते तसे परिक्रमावासी ने करावयास हरकत नसावी असे माझे स्पष्ट मत आहे . याचा अर्थ अगदी उड्या मारून पोहावे असे नाही . तसे केल्यावर नर्मदा माता शासन करते हा देखील अनुभव प्रस्तुत लेखकाने परिक्रमा संपल्यावर गतवर्षीच घेतलेला आहे .  परंतु जिथे डुबकी मारता येईल अशा साधारण कमरे एवढ्या खोल नर्मदा जला मध्ये आवर्जून जावे आणि स्नान करावे , किंवा वरती व्हिडिओ टाकला आहे त्या पद्धतीने पडून राहणे जमत असेल तर नर्मदा जलावर शांत पडून राहावे . तिचा प्रत्यक्ष स्पर्श खूप काही देऊन जातो हा स्वानुभव आहे . काही साधूंनी देखील याला पुष्टी दिलेली आहे . असो . 
इथे अशा पद्धतीने अनेक गाणी म्हटल्यानंतर आम्हाला भुकेची जाणीव झाली आणि आम्ही गावांमध्ये असलेल्या एका आश्रमाच्या दिशेने चालू लागलो . हे दोघे बंगाली आधीच त्या आश्रमामध्ये उतरलेले होते . कारण आश्रम रस्त्यावरती होता आणि मला मात्र इथे थोडे लांबून जावे लागत होते .

हाच तो बाबरी गावातील आश्रम जिथे आम्ही भजन करत बसलो होतो .
 आश्रमामध्ये गेल्यावर अजून भोजन प्रसाद तयार झाला नाही असे लक्षात आल्यावर तिथे पडलेला ढोलक मी घेतला आणि पुन्हा एकदा आमचे भजन सुरू झाले ! एका भजनातून दुसऱ्या भजनामध्ये जाण्याची सुमनला सवय होती . तसेच बसल्या बसल्या तो काहीतरी शीघ्र काव्य करून जोडून टाकायचा . त्याचे युकेलेलो तंतुवाद्य आणि त्याच्या मुखातील स्वर यांच्या स्वरांचा तसा एकमेकांशी काही नाते संबंध नसायचा , हे संगीतातील जाणकार ताडतीलच .परंतु भावपूर्ण असल्यामुळे लोकांना ते गाणे आवडायचे .काल कोकसर येथे भेटलेला युपीचा भटका साधू मात्र संगीताचा त्रास होऊ लागल्यामुळे उठून निघून गेला !
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सात्यकी घेतच होता . तो आपल्यासाठी सोबत जोडत आहे .

भजन झाल्यावर मस्तपैकी पुरी डाळ भात असे भोजन घेतले . आणि आता विश्रांती घेण्यापेक्षा वाळूचा टाकू पार करावा असे ठरवून सर्वांना नर्मदेहर केले . सात्यकी आणि सुमन यांना माझ्यासोबत चालायची इच्छा होती . परंतु मला एकट्याने चालायचे होते त्यामुळे मी एक युक्ती केली . वाळूच्या किनाऱ्यापर्यंत तर आम्ही एकत्र गेलो परंतु नंतर मी कठीण अशा वाळूच्या ढिगाऱ्यांमधून चालायला सुरुवात केली व यांनी सोपा असा डाव्या हाताचा पायवाट मार्ग पकडला . तुलनेने त्यांची गती त्यामुळे आपोआपच माझ्यापेक्षा अधिक असायची . यांचे व्हिडिओ आणि रिल्स बनवणे अखंड सुरू होते . त्यामुळे ते अजून मधून काठाकडे यायचे तेव्हा आमची पुन्हा भेट व्हायची . शेवटी आता काही काळ यांच्यासोबत चालणे क्रमाप्राप्त आहे हे लक्षात आल्यावर मी त्यांची परिक्रमेचे मागची मानसिकता , भूमिका समजून घेत चालायला सुरुवात केली . बंगाली माणसांवर जन्मजात डाव्या विचारांचा प्रभाव असतोच असतो हे अगदी सहजपणे पाहायला मिळते . सलग पस्तीस वर्षे एकाच विचारसरणीच्या डाव्या मुख्यमंत्र्यांनी राज्य केल्यामुळे तेथील अनेक पिढ्या डाव्या झालेल्या आहेत . त्याचे प्रतिबिंब या दोघांशी बोलताना लगेच उमटायचे . परंतु त्यांना काही मनापासून पडलेल्य शंका होत्या . प्रश्न होते . त्याची उत्तरे आपल्याला बंगालमध्ये मिळणार नाहीत हे माहीत असल्यामुळे ते नर्मदे काठी आले होते . त्यांची हीच प्रामाणिकता मला भावली होती . हा वाळूचा किनारा संपता संपत नाही . आणि तो आयुष्यात कधी संपूच नये असे वाटावे इतका तो सुंदर आहे ! पांढरी शुभ्र वाळू आणि उजव्या हाताला वाहणारी शांत धांत धीरोदात्त नर्मदा मैया ! सर्वत्र पाण पक्षी ! इथे मला काही कोल्ह्यानी देखील दर्शन दिले . तहानलेला प्रत्येक जीव पाणी पिण्यासाठी नर्मदे कडेच येतो . आपल्या हृन्मंदिरातली जन्मानुजन्मीची तृषा क्षमविण्याचे सामर्थ्य असलेली ही रेवामाई आहे !
दुसरा बंगाली भेटल्यामुळे सात्यकी ने आता अवधूत चा गट सोडून दिला होता ! दोघांची चांगली मैत्री जमली होती . दोघे एकाच जिल्ह्यातील होते हा योगायोग . त्यांच्या दुर्दैवाने ते आपापसामध्ये काय बोलत आहेत ते सर्व मला कळायचे ! परंतु माझ्या दृष्टीने ते इथे आले हेच अधिक महत्त्वाचे होते . एकदा दरबारामध्ये हजेरी लावल्यावर पुढे त्यांचे काय करायचे हे ठरवायला माता राणी तिथे दिवस रात्र वाहतेच आहे ! 
दोघांनी या भागामध्ये भरपूर फोटोसेशन केले . त्यांच्या फेसबुक वर पुढे हे फोटो सापडले .ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे त्यामुळे आपल्याला हा परिसर कसा होता ते लक्षात येईल . यातील बहुतांश फोटो / व्हीडीओ काढताना मी त्यांच्या आजूबाजूला किंवा सोबतच होतो . काही फोटो तर त्यांचा कॅमेरा घेऊन मी देखील काढलेले आहेत .
सुमन मुजुमदार आणि प्रस्तुत लेखक बाबरी घाटावर
 सुमन मुजुमदार
 परिक्रमेमध्ये पिण्याचे पाणी फक्त नर्मदेचेच वापरावे असा संकेत आहे . परंतु वाळूचा किनारा असेल आणि तो उथळ असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळे आणि माती असल्यास गढूळपणा असतो . अशावेळी नावाडी तुम्हाला विचारत असतात की तुम्हाला कमंडलू भरून आणून देऊ का . मला अनेक वेळा अशा पद्धतीने कमंडल भरून केवट लोकांनी आणून दिला . मी चालताना पाहिले की सुमन मुजुमदारला देखील अशा पद्धतीने एक नावाडी कमंडलू भरून आणून देत आहे आणि सात्यकी त्याचा व्हिडिओ घेत होता . वाचकांकरता तो व्हिडिओ . नर्मदे वरचे वातावरण किती सुंदर असते ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल .



असो . हे सर्व प्रकार पाहिल्यावर आपण एकटे चालत आहोत ते किती उत्तम आहे हे लक्षात आले आणि पुन्हा एकदा काठाकाठाने एकटा चालू लागलो . अतिशय तापलेली वाळू जरी असली तरी जिथे नर्मदा आणि वाळू एकत्र येतात तिथे थोडीशी थंड वाळू सापडते . हा पट्टा पकडून चालत राहायचे . याच्यामध्ये मात्र कधीतरी अचानक भस् करून पाय खड्ड्यात जातो . तिथे वाळूच्या खालून नर्मदेला मिळणारे पाण्याचे प्रवाह असतात . असे प्रवाह अक्षरशः शेकड्याने आहेत . गुगल नकाशा मध्ये आपल्याला असे प्रवाह दिसतात . 
 डेमावर किंवा डिमावर गावामध्ये नर्मदेला घेऊन मिळणारे असंख्य भूमीगत जल प्रवाह . वाळूतून चालताना हे दिसत नाहीत परंतु त्यावर पाय पडला की पाय गुडघ्यापर्यंत आत जातो ! त्यामुळे काठी खोचत खोचतच काठाने चालावे लागते .
अशा असंख्य नद्या आणि ओढे ,नाले नर्मदेला येऊन मिळत असतात . त्यांना घाबरून पार करण्यासारखा रस्ता शोधायला डावीकडे वळले तर तुमची पायपीट वाढते . त्यापेक्षा किती का खोल असेनात , त्याच्यामध्ये उतरून कमरे एवढ्या किंवा छाती एवढ्या पाण्यातून चालत हा जलप्रवाह पार करणे अधिक सोपे आणि हिताचे असते .मी वाटत आलेला जवळपास प्रत्येक जलप्रवाह असाच त्यात उतरून पार केला . आणि तिथले बॅक्टेरिया देखील माझ्या गट बॅग मध्ये अर्थात पोटाच्या पिशवीत भरून घेतले ! म्हणजे त्या प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी मी प्यायलो !
अशीच एक फार मोठी नदी मध्ये आडवी आली . त्या नदीने नर्मदेच्या काठी इतका मोठा दलदलीचा प्रदेश निर्माण केला आहे की पार करताना अक्षरशः वाट लागते ! परंतु मी ठरवले की आपल्याला कितीही भिजले तरी चालेल परंतु नदी पाण्यातूनच पार करायची ! आणि त्याप्रमाणे ती पार केली सुद्धा ! 
 हीच ती नदी जिने पार करता करता नाकी नऊ आणले
आता नर्मदा अचानक उजवीकडे वळत होती . समोर असलेली चांदगड कुटी आता दिसू लागली . परंतु काठाने चालता चालता वाळूच्या एका टोकावर आलो . आणि मग लक्षात आले की इथे अजून एक नदी नर्मदेला येऊन मिळते आहे ! 
हेच ते टोक आणि समोर दिसणारी चांदला कुटी
सूर्यास्त होत होता आणि समोर चांदगडच्या पायऱ्या दिसू लागल्या होत्या . परंतु आता अजून एक नदी आडवी आली त्यामुळे प्रश्न निर्माण झाला . ही नदी बऱ्यापैकी गतिमान आणि खोल होती . शिवाय इंद्रावती नदीचा ताजा अनुभव गाठीशी असल्यामुळे हिच्या मध्ये उतरायची मला इच्छा नव्हती .
डावीकडे वळून काठाने चालायला सुरुवात केली
ह्या नदीच्या काठाने मी ओलांडण्या योग्य जागा शोधत मागे मागे चालू लागलो . सूर्य वेगाने मावळतीला निघाला होता .
परंतु कितीही अंतर चालले तरी या नदीतले पाणी काही संपे ना ! नदीमध्ये चिखल देखील खूप होता . शेवटी नर्मदेचे नाव घेतले आणि मागे सरकून वेगाने धावत ही नदी पार केली . वाळू मध्ये पाय रुतणारच नाहीत अशा गतीने पाय उचलले ! पुरता भिजलो परंतु नदी पार झाली . पुन्हा उलटे चालत घाट गाठला

चांदगड कुटी चा घाट अरुंद व अतिशय खडा चढ असलेला असून चढताना दमविणारा आहे . समोर मी पोहोचलो होतो ते वाळूचे टोक दिसते आहे .
घाट सुंदर रंगवलेला असून वरती आल्या आल्या आश्रमाचे दर्शन होते . 
मागे वळून पाहिल्यावर केवढे मोठे अंतर वाळूतून चालत आलो ते स्पष्ट दिसते .
जिथवर नजर जाईल तिथवर वाळूच वाळू ! डोळ्याचे पारणे फेडणारे असे हे दृश्य आहे . हाच किनारा दगडमातीचा असता तर निम्म्याहून निम्म्या वेळामध्ये पार झाला असता .
हा थकविणारा जिना एका दमात चढून पळत वरती पोहोचलो
 .कितीही चढले तरी हा जिना संपतच नाही !
गेल्या गेल्या प्रशस्त अंगण आणि भव्य मंदिर दिसते . 
प्रांगणाच्या समोरच साधू कुटी आणि परिक्रमावासींची ही निवास व्यवस्था केलेली आहे .
चित्रामध्ये एक मनुष्य चालताना दिसतो आहे साधारण त्या जागी काँक्रीटच्या कोब्यावर नर्मदा मातेची पावले उठलेली आहेत असे मला तिथल्या एका पंडिताने दाखविले . एका सहा वर्षाच्या मुलीची दोनच पावले उठलेली असून पुढची मागची पावले दिसत नाहीत ! आश्चर्यच आहे ! त्या मुलीने उडी मारली असे समजावे , तर आजूबाजूला सर्वत्र भरपूर सिमेंट आहे .त्यात कुठेतरी तिची पावले उठली असती .तशी ती उठलेली नाहीत त्यामुळे ही पावले तिथे असणे आश्चर्यकारक आहे .
आश्रमातील या मंदिरामध्ये अनेक प्रकारची वाद्ये ठेवलेली होती .
माझ्यापाठोपाठ दोघे बंगाली देखील तिथे पोहोचले . त्यामुळे इथे बसून आम्ही पुन्हा भजन केले .रात्री उशिरापर्यंत आमचे भजन सुरू होते .
या आश्रमामध्ये मी प्रवेश केल्या केल्या एक पंडित माझ्याकडे आला आणि म्हणाला आप अगर असली परिक्रमा वासी है तो मेरे एक प्रश्न का उत्तर दीजिए . आता हे काय नवीन प्रकरण म्हणून मी बुचकळ्यात पडलो . तो मला म्हणाला , "बताईये सबसे कम समय में नर्मदा मैया की परिक्रमा कैसे की जाती है ! " मी विचारात पडलो . क्षणाचा ही विलंब न लावता पंडिताने माझ्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाला , " हो गई मेरी परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा वासी के साथ साक्षात नर्मदा मैया हमेशा वास करती है ! इसीलिए जब भी मुझे कोई परिक्रमा वासी मिलता है तो मै उसकी परिक्रमा कर लेता हु । इस प्रकार मेरी हजारो नर्मदा परिक्रमा हो चुकी है । " त्याच्या या श्रद्धायुक्त बुद्धी चातुर्या चे मला कौतुक वाटले . यावरून मला गणपती आणि कार्तिक स्वामींची गोष्ट आठवली . जेव्हा महादेवांनी संपूर्ण ब्रम्हांडाची परिक्रमा करून यायला सांगितले तेव्हा कार्तिक स्वामी खरोखरच संपूर्ण जगाची परिक्रमा करून आले . आणि गणपतीनी मात्र आई-वडिलांची परिक्रमा केली . कारण आई-वडील हेच साक्षात परब्रह्म आहेत . असा जरी या कथेचा भावार्थ असला तरी त्या घटनेचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत . कसे ते सांगतो . भगवान कार्तिकेय स्वामी जेव्हा विश्व परिक्रमा करून आले तेव्हा त्यांनी या परिक्रमेवर आधारित एक अनुभव ग्रंथ लिहिला . ज्याचे नाव स्कंदपुराण . या स्कंद पुराणातील रेवा खंड नावाचे प्रचंड मोठे प्रकरण म्हणजेच कार्तिक स्वामींनी नर्मदा खंडामध्ये विहार करून लिहिलेली , त्यांच्या प्रवासाची डायरी आहे , असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . यालाच लोक नर्मदा पुराण असे सुद्धा म्हणतात . असो .
मी आसन लावले तिथे एका कोपऱ्यामध्ये आधीच एक तरुण जोडपे उतरलेले होते .दोघे मराठीमध्ये बोलत होते . यातला तरुण अखंड बिड्या पीत होता . त्याला दिवसाला दीडशे बिड्या लागायच्या . आणि या आश्रमातर्फे त्याला त्या दिल्या जात होत्या . मला एकंदर हा प्रकार काही आवडला नाही . या आश्रमामध्ये रामदास नावाचे एक त्यागी साधू राहत होते . इथे गावकऱ्यांनी कब्जा केलेला होता तो मोकळा करून त्यांनी मठ ताब्यात घेतला होता . काही ग्रामस्थ बाहेर मला भेटले होते त्यांचे साधू बद्दल मत फारसे चांगले नव्हते . परंतु मागे एकदा मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे अशा प्रसंगांमध्ये गावकरी अधिक स्वार्थी असतात असे लक्षात आलेले आहे . साधू स्वार्थी असूच शकत नाही अशी त्याची जडणघडण झालेली असते . साधूला जितके भविष्याचे ज्ञान असते तितके ग्रामस्थांना नसते .त्यामुळे असे काही घडल्यावर ग्रामस्थांनी साधुला नावे ठेवणे स्वाभाविक आहे . साधू शक्यतो कोणाची फिकीर करत नाहीत . असो तर हे साधु महाराज अखंड धूम्रपान करत होते . त्यांना प्रचंड दम्याचा त्रास होतो आहे हे मला दिसत होते . त्यांना अखंड ढास लागलेली होती . तरीदेखील ते चिलीम काही सोडत नव्हते . या विषयावर त्यांच्याशी बोलावे असे मला वाटले तेव्हा त्यांनी मला त्यांची कर्मकहाणी सांगितली . त्यांचा दम्याचा विकार इतका बळावला होता की नर्मदा मातेचे दर्शन घेऊन तो खडा जिना देखील वर चढण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नव्हती . यावर काही प्राणायाम माहिती असेल तर मला सांगा असे ते म्हणाले . मी त्यांना काही प्राणायाम शिकवले . इतक्यात सुमन तिथे आला . "ये बंगाल के बहुत बडे महाराज है। " मी चेष्टेमध्ये त्याची ओळख करून दिली !त्याचा एकंदरीत अवतार पाहून साधू महाराजांनी त्यांच्या आसनावर त्याला बसविले ! मी देखील मग गमतीने सांगू लागलो की हे फार मोठे तपस्वी आहेत ! बंगाल चे असल्यामुळे यांना बऱ्याच विद्या येतात वगैरे ! झाले ! मला बंगाली जादू शिकवा म्हणून तिथले काही लोक त्याच्या मागे लागले ! मी बंगालीमध्ये त्याला सांगितले की कोणालाही नाही म्हणू नकोस आणि मजा बघ ! खरोखरच आश्रमातील सर्वच लोक शेपटासारखे त्याच्या मागे फिरू लागले ! पुढे  काही ठिकाणी सुमन मला भेटला की हा प्रसंग आठवून आम्ही खूप वेळ हसायचो ! सुमन बाबा झाला होता आणि सात्यकी त्याचा चेला ! इकडे तरुण जोडप्याचे अखंड भांडण सुरू होते . त्याच्या अतिरिक्त धूम्रपानाच्या सवयीमुळे मृत्यू त्या युवकाला लवकर गाठणार हे स्पष्ट दिसत होते . त्याचा श्वास सतत फुललेला असायचा . मी त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला . पण त्यांना ऐकण्यात रसच नाही असे पाहिल्यावर मौन राहिलो . संध्याकाळी स्नान आरती आटोपून सार्वजनिक आरती केली . भरपूर भोजन केल्यावर चिकार भजनही केले ! इथे आल्यापासून ते झोपेपर्यंत दोघे बंगाली ही चंद्र देवाची तपोभूमी आहे ही आहे या मुद्द्यावरून खूप थट्टा मस्करी करत होते . त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . परंतु ऐकत नाहीत पाहिल्यावर अमावस्येचा चंद्र झालो . रात्री उशिरापर्यंत तो तरुण बिड्या फुकत होता . त्याच्यामुळे ती सगळी खोली धुराने भरलेली होती . त्याला इथे ठेवून घेण्यामध्ये कोणाचा काय स्वार्थ असू शकतो ? नुसत्या कल्पनेने देखील अंगावर काटा येत होता . पहाटे मी निघताना त्याची पत्नी बाहेर नळावर भेटली . मला जी शंका होती ती योग्य असू शकते असे तिने मला अप्रत्यक्षपणे सूचित केले . अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पराधीन अबला स्त्रीने काय करावे ? साराच विषय अतिशय कठीण आणि नाजूक होता . परंतु तिने परिस्थितीशी जुळवून घेतले होते . आणि त्यात ती सुखी होती . ज्याचा त्याचा प्रश्न . त्या मातारामच्या पाया पडून आश्रमाला नर्मदे हर केले . नर्मदेला सर्वांच्या इच्छा आकांक्षांची काळजी आहे . नर्मदा कळणे खरेच कठीण आहे . कधी ती धुवाधार च्या खडकासारखी कठीण आहे . कधी ती इंद्रावतीच्या गाळासारखी मऊ आहे . कधी ती डिमावरच्या वाळू सारखी सटकून जाते . तर कधी ती जलहरी घाटासारखी खोल आहे . कधी ती सहस्रधारेसारखी अल्लड आहे . कधी ती घुघुआ घाटासारखी अवखळ आहे . कधी ती कपिलधारेसारखी बिनधास्त झेपावते . तर कधी ती नर्मदापुरमसारखी शांत धीर गंभीर भासते . कधी ती रत्नासागरासारखी विस्तारलेली आहे . तर कधी अमरकंटक सारखी एका फुटात मावली आहे . अशी ही नर्मदा आहे . हर हर नर्मदे ! नर्मदे हर हर !


लेखांक छपन्न समाप्त ( क्रमशः )

लेखांक ५७ : भव्य भिलाडिया घाट , भयप्रद पोपवंती नदी आणि हमीदपूरचे मौनी सन्यासी

चांदगढ कुटी सोडल्यावर काठाने रस्ता नाही असे तुम्हाला ग्रामस्थ सांगतात . परंतु एक पाऊल ठेवता येईल असा रस्ता सर्वत्र आढळतो .  इथे सुमारे दहा किलोमीटर सरळ वाहून नर्मदा वेगवान घातक वळण घेत असल्यामुळे चालण्यासारखा मार्ग फारसा शिल्लक नाही हे खरे आहे . त्यातच नर्मदेला दोन मोठे ओढे आणि लहान मोठे नाले येऊन मिळतात जे तुमचे चालणे कठीण करतात . हे दोन्ही ओढे मोठ्या शिताफीने पार करत मी काठाने चालत राहिलो . 
हेच ते ओढे आणि हाच तो किनारा .

इथे समोरचा किनारा प्रचंड वाळू असलेला आहे . इथे उपग्रह चित्रांमध्ये देखील दिसतील इतक्या मोठ्या संख्येने वाळू उपसणारी यंत्रे आहेत .  वाळू उपसणारी यंत्रे , त्यांना वाहून आणणाऱ्या यांत्रिक नौका आणि त्यांची वाहतूक करणारी मोठाली अवजड वाहने या सर्वांच्या आवाजाने या भागातला किनारा दुमदुमून गेलेला असतो . त्यामुळे खालील उपग्रह नकाशा जितका सुंदर दिसतो आहे तितकेच येथील ध्वनी प्रदूषण कष्टदायक आहे . 

वरील नकाशातील प्रत्येक रेखा म्हणजे वाळू उपसणाऱ्या भूमिगतयंत्राने उपसून ठेवलेली वाळू असून या दांड्यावरून एकावेळी दोन डंपर जातील इतके ते रुंद आहेत . ( नकाशात उत्तर दिशा तिरकस केलेली आहे )

इथून पुढे एक डोह कूप लागले .  ( जॅकवेल ) इथे पाणी प्रचंड खोल असल्यामुळे जाण्याचा मार्ग बंद होता . परंतु या विहिरीच्या पलीकडे लपलेला भव्य आणि सुंदर घाट दिसताच कधी एकदा घाटावर पोहोचतो असे झाले !
 भिलाडिया घाटावरील डोहकूप
 वरती चढून गावातील एक रस्ता घाटावर येत होता . इथे एक छोटीशी चार फूट आकाराची टपरी होती . सुनील किराणा नावाच्या या दुकानदाराने मला बिस्किटे ,गुडदाणी , शेव वगैरे भरपूर खाऊ दिला .
लाल खुणेच्या मागे दिसणारी छोटीशी हिरवी टपरी म्हणजे सुनील किराणा
  त्याला मी पैसे देणार इतक्यात तिथे घाटावरील राम मंदिराचे पुजारी आले . यांचा चेहरा मला ओळखीचा वाटला . त्यांनी सर्व पैसे भरले . आम्ही तिघे काही काळ तिथे बोलत उभे राहिलो . यांचा मुलगा बरमान घाटावर शारदा संस्कृत पाठशाळेमध्ये शिकायला होता . अनुज व्यास असे त्याचे नाव होते . त्याची खुशाली मी वडिलांना सांगितल्यावर त्यांना खूप बरं वाटलं . कारण माझ्यासोबत जी दोन-तीन मुले शारदा पाठशाळेमध्ये फिरत होती त्यात अनुज देखील होता . त्याचा चेहरा हुबेहूब वडिलांसारखा असल्यामुळे मला मगाशी गुरुजींना कुठेतरी पाहिले आहे असे वाटत होते .पूर्वीच्या काळामध्ये आप्त स्वकीयांची ख्याली खुशाली अशीच कळत असायची . मुलाने आई-वडिलांना फोनवर "आय एम ओके " असे सांगणे आणि एखाद्या माहितगार माणसाने प्रत्यक्ष भेटून त्याची परिस्थिती आता खरोखर कशी आहे हे पालकांना सांगणे याच्यामध्ये किती फरक आहे हे आपण जाणताच . व्यास गुरुजींनी मुलाची व्यवस्थित चौकशी माझ्याकरवी करून घेतली . आणि स्वतः माझ्यासोबत येत संपूर्ण घाट मला दाखवला . .शारदा आश्रम संस्कृत पाठशाळा अतिशय चांगली आहे याबाबतीत आमच्या दोघांचे एकमत झाले.  इथे ऋषिकेश मधल्या कैलास आश्रमाची एक शाखा आहे . अतिशय स्वच्छ नीटनेटका टापटीप आश्रम असून येथे साधुसंत , संन्यासी , बैरागी , वितरागी , तडी ,तापसी , परिक्रमावासी या सर्वांच्या मुक्कामाची उत्तम सोय केलेली आहे . इथे चातुर्मास करण्याकरता बरेच लोक येतात . दुर्दैवाने मला व्यवस्थापकांचे दर्शन झाले नाही कारण आश्रमामध्ये कोणीच नव्हते . परंतु आश्रमातील छोट्या छोट्या देवालयांची दर्शनी घेऊन पुढे राम मंदिराकडे गेलो . 
भिलाडिया हे नर्मदापुरम जिल्ह्यातील शेवटचे गाव असून इथून पुढे हरदा जिल्हा चालू होतो .
कैलास आश्रमाचे प्रवेशद्वार

कैलास आश्रमातील सुंदर लघु मंदिरे .

मंडलोई नावाच्या राजांनी ही सर्व मंदिरे आणि घाट बांधलेला आहे . रामाचे मंदिर अतिशय सुंदर असून त्याची कलाकुसर लक्षात राहील अशी आहे . मंदिराचा परिसर आणि मंदिर अतिशय पवित्र आहे . 
 भिलाडीया घाटावरील भव्य आणि सुंदर श्रीराम मंदिर
समोरील शिव मंदिरातून दिसणारे राम मंदिर आणि डावीकडे छोटेसे केशरी हनुमंत रायाचे देऊळ .
श्री राम प्रभूंचा विग्रह
राम मंदिरामध्ये मंडलोई राजांचे फोटो लावलेले आहेत .हे राजघराणे आपल्या दानशूरतेसाठी आणि धार्मिकतेसाठी प्रसिद्ध होते .पूर्वी राजे रजवाडे आपल्या वैयक्तिक खर्चातून सार्वजनिक देवालये , घाट ,उद्याने इत्यादी बांधत असत .
समोर हनुमंताचे छोटेखानी मंदिर असून ते देखील खूप सुंदर आहे . माझ्या मनामध्ये पूर्वी एक संकल्पना होती . घर तिथे मंदिर . ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येक मनुष्याने आपल्या आवडत्या जागेमध्ये एक छोटेसे मंदिर आपल्या आराध्य दैवताचे बांधून ठेवावे . ते शक्यतो दगडामध्ये असावे . कारण सिमेंट काँक्रीटचे आयुष्य सत्तर ऐंशी वर्षे असते आणि दगडाचे आयुष्य सहाशे ते हजार बाराशे वर्षांपर्यंत असते . त्यासाठी मी ज्या मंदिराची कल्पना केली होती अगदी हुबेहूब तसे हे हनुमंताचे मंदिर होते . इथून नर्मदा नदीचे उत्तम दर्शन होत होते . समोर शिवमंदिर होते . 
राम मंदिर
भिलाडिया घाटावरील महादेव
राम मंदिराचा परिसर स्वच्छ , सुंदर व  पवित्र आहे .
भिलाडीयाचा घाट अतिशय सुंदर , सुबक ,आखीव रेखीव आणि देखणा आहे . या घाटावर लोकांची सतत वर्दळ असते . शिव मंदिरामध्ये जाऊन शंकराचे दर्शन घेतले . आणि पुढे प्रस्थान ठेवले . तत्पूर्वी आपण देखील घाटाचा परिसर थोडा पाहून घ्यावा . 
भिलाडिया घाटावरील हनुमंताचे सुंदर रूप
 भिलाडिया घाटाची सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार
घाट आखीव रेखीव सुबक आणि सुंदर आहे . महापुरामध्ये उतरण्याकरता वेगळ्या पायऱ्या केलेल्या आहेत .
भिलाडिया घाटावर भाविकांची नित्य वर्दळ असते
एकंदरीत हा एक सुंदर व लक्षात राहणारा घाट आहे .
इथून पुढे किनारा पकडल्यावर लगेचच गावाची स्मशानभूमी आहे . इथे कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती वारली होती आणि अंत्येष्टी सुरू होती . अशाप्रसंगी कोणी परिक्रमा वासी तिथून गेला तर ते शुभ मानले जाते . त्यामुळे मी देखील कलेवराचे अंत्यदर्शन घेऊन मुखामध्ये नर्मदा जल टाकले आणि पुढे निघालो . जीवनाचे शाश्वत सत्य अनुभवायचे असेल तर स्मशानासारखी जागा नाही ! नर्मदे काठी प्रत्येक गावाचे स्मशान असल्यामुळे अनेक चिता अनेक अंत्ययात्रा अनेक दाहक अनुभूती येतात . या तुम्हाला निश्चितार्थाने अंतर्मुख करतात . तसेच चिंतन करत पुढे निघालो . हा उभा तट असलेला किनारा असल्यामुळे चालताना थोडेसे लक्षपूर्वक चालावे लागे . जरा दुर्लक्ष झाले की किमान पाच-सहा फूट ते कमाल पंधरा-वीस फूट खाली पडावे लागायचे . पडताना झाडेझुडपे असायची त्यामुळे फार गंभीर दुखापत व्हायची नाही परंतु खरचटणे , रक्त येणे वगैरे या भागात खूप किरकोळ आहे . विशेषतः काटेरी वनस्पती तुमच्या अंगावर चांगले नक्षीकाम करून ठेवतात . चालून येणारा घाम त्या जखमांवरून जाताना सुंदर पैकी देह बुद्धीची जाणीव करून देतो . इथे वाळू उपसणाऱ्या नावा समोरच्या बाजूला दिसतात . त्यांची संख्या अक्षरशः हजारामध्ये आहे . इतक्या वाळू उपसणाऱ्या नवा एकाच वेळी एकाच ठिकाणी नर्मदेमध्ये अन्यत्र कोठेही पाहिल्या नाहीत .  यातील बंद पडलेली एक नाव खोल बाजूला म्हणजे मी चाललो होतो त्या किनाऱ्याला आणून लावलेली होती . त्या नावेतील लोकांशी चर्चा केल्यावर मला कळाले की साधारण अडीच लाख रुपयांमध्ये एक नाव बनवून मिळते . पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे इंजिन या नावेला जोडावे लागते . ही इंजिने खूप आवाज करतात . प्रत्येक वेळेस क्षमतेपेक्षा जास्त वाळू नावे मध्ये भरलेली असते त्यामुळे इंजिन अधिक आवाज करतात . या भागामध्ये मैय्या साधारण ओंकाराच्या आकारामध्ये वाहते असे लोक म्हणतात .  इथे नर्मदा इतकी प्रचंड वाळू आणून टाकते की रात्रंदिवस उपसून देखील इथली वाळू शिल्लकच आहे . वाळू उपसा करणाऱ्या लोकांच्या दंग्यामुळे इथले पक्षी जीवन आणि निसर्ग मात्र चांगलाच प्रभावित झालेला दिसतो .  समोरच्या तटावरील गावांमध्ये घरोघरी वाळू उपसणारे जेसीबी ,ट्रॅक्टर वगैरे उपकरणे आढळतात .
नर्मदेमध्ये वाळू उपसणारा जेसीबी एक्सकॅव्हेटर
 उपसलेली वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर
सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार
वाळूचा उपसा आणि त्यामुळे गढुळलेले नर्मदा जल .
 नावाच नावा !
 वाळू गोळा करण्यासाठी इथे जमलेल्या काही लोकांशी मी बोललो . त्यातील बऱ्याच लोकांना ही नर्मदा नदी आहे हे देखील माहिती नव्हते . हे ऐकायला धक्कादायक वाटेल परंतु सत्य आहे . पोटाची खळगी भरण्याच्या नादात इतके घोर अज्ञान पाहून वाईट वाटले . ही नदी कुठली आहे तेच माहिती नसल्यावर पुढे जाण्याचा रस्ता आहे किंवा नाही हे या लोकांना विचारणे मूर्खपणाचे ठरले असते . शक्यतो केवट लोक पुढे एखादे संकट असेल किंवा एखादा ओढा , नाला , नदी येऊन मिळत असेल तर परिक्रमा वासी ना आधीच सावध करतात . कठीण रस्ता असेल तर ते देखील सांगतात . इथे देखील मला एक स्थानिक डोंगा वाला भेटला .त्याने मला सांगितले की पुढे पोपवंती नावाची खूप मोठी नदी आहे . तरी तुम्ही वरून पुलावरून पार करावी . 
तत्पूर्वी इथे एका निर्जनास्थळी पंचाग्नी साधन करत बसलेले एक साधू महाराज दिसले .चहू बाजूने जाळ करून ऐन उन्हामध्ये तीन तास बसून राहायचे आणि असे १८ वर्षे साधन करावे लागते ! साधनेची वेळ सकाळी नऊ ते बारा किंवा दुपारी बारा ते तीन अशी असते . याचा आरंभ वसंत पंचमीला केला जातो व पुढचे चार महिने ही साधना केली जाते . चांदगड कुटी मधले रामदास बाबा होते त्यांनी देखील ही साधना केली होती पूर्वी मला भेटलेले राधा रमण दास देखील ही साधना करत होते . साधू महाराजांना साष्टांग प्रणिपात केला आणि वरती चढलो .
वरती एका शेतामध्ये गेलो असता तिथे शेतकरी काम करत बसला होता . त्याला मी विचारले की नदी पार करण्यासाठी एखादा सोपा मार्ग आहे का . तो एक क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला की नाही इथून दोन किलोमीटर पुढे पूल आहे .त्यानेच तुम्हाला जावे लागेल .
मी विचार करू लागलो . आता काठापासून दोन किलोमीटर लांब जायचे आणि पुन्हा दोन किलोमीटर उलटे नर्मदे कडे यायचे , यापेक्षा पोहत नदी पार केलेली परवडते . मी त्याला म्हणालो की दादा थोडासा कठीण रस्ता असला तरी चालेल . मी पार करेन परंतु मला नर्मदा मातेचा किनारा सोडायला लावू नका . शेतकरी क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला ठीक आहे एक रस्ता तुम्हाला सांगतो . आणि त्याने मला त्याच्या शेतातून खाली उतरून एक छोटा ओढा ओलांडून पलीकडे जाऊन जंगलातून काही अंतर चालल्यावर पोपवंती नदी कशी पार करायची ते सांगायला सुरुवात केली . परंतु नंतर त्याने एक क्षणभर डोळे मिटले आणि तो मला म्हणाला की बाबाजी हा रस्ता अतिशय भयानक आहे आणि इथे जर तुम्ही घसरून पडलात तर तुमचे शरीर देखील सापडणार नाही इतकी भयंकर नदी आहे . त्यापेक्षा एक काम करूया . मी तुम्हाला नदी पार करून देतो . आता स्वतः स्थानिक मार्गदर्शकच आपल्यासोबत येत आहे म्हटल्यावर मला देखील खूप आनंद झाला ! 
मी आपला त्याच्या मागे मागे चालत निघालो . गुडघाभर पाण्यातून आधी एक ओढा आम्ही पार केला . सर्वत्र भरपूर चिखल होता . जाता जाता त्या शेतकऱ्याच्या आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या . याचे नाव कमल होते . हळूहळू पोपवंती नदीचा आवाज येऊ लागला . एका झाडीतून आम्ही बाहेर आलो आणि समोर अतिशय नितांत सुंदर अशी काळ्या कभिन्न बेसाल्ट पाषाणाला भेदत खळाळत वाहणारी पोपवंती नदी आडवी आली ! तिचे रूप पाहताच बसावे असे होते ! जागोजागी छोटे-मोठे धबधबे तयार करत भयंकर खळखळाट करत ही नदी अतिशय वेगाने वाहत होती . या नदीच्या एकूण तीन मोठ्या धारा आम्हाला पार करायचे होत्या . आणि जसजसे आम्ही नदी पार करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की खरोखरीच ही नदी एकट्याने पार करणे मला शक्यच नव्हते इतका तो रस्ता भयानक होता . कारण ज्या काळ्यापाषाणावर मी उभा असायचो तिथून पुढचा पाषाण उडीच्या अंतरावर असायचा . परंतु शेवाळलेला असायचा . आणि खाली १५ ते २० फूट खोल दरी होती ज्यात नदीचे पाणी गायब व्हायचे . आणि उजव्या हाताला सुमारे ५० ते ५५  फूट खोल दरीमध्ये पुन्हा प्रकट व्हायचे . इतकी भयानक नदी मी यापूर्वी पाहिली नव्हती . पाण्याला गती देखील प्रचंड होती . जो दगड पाय ठेवण्यासाठी सोपा वाटायचा त्यावर पाय ठेवल्याबरोबर तो गरकन फिरून वाहून जायचा . आणि ज्या प्रवाहामध्ये पाय ठेवणे शक्यच नाही असे आपल्याला वाटायचे तीच खरी पाऊल ठेवण्याची जागा असायची .  अशा पद्धतीचे भूल भुलैया असलेली ही नदी एकट्याने पार करता येणे अशक्य होते व अशक्यच आहे . कमल सांगू लागला , " खरे तर इथून दोन किलोमीटर पुढे शेतातून चालत गेले की सडक मार्ग लागतो तिथे या नदीवरचा पूल आहे . सगळे परिक्रमावासी तिकडूनच ही नदी पार करतात . या भागातून कोणी येतच नाही . म्हणून मी तुम्हाला तिकडेच पाठवणार होतो . परंतु आतून बाबांनी मला सांगितले की त्याला माझी गुफा दाखव आणि स्वतः नदी पार करून दे . " "कोणते बाबा ? " मी विचारले . हा कमल जेव्हा लहान होता तेव्हा गुरे वळायला या नदीच्या काठावर यायचा . अशीच गुरे वळताना एकदा त्याला कोणीतरी नदीकडे जाताना दिसले . हा पटकन तिकडे गेला असता एक मोठा जटाधारी साधू अदृश्य झालेला त्याला दिसला . तिथून पुढे तो रोज त्या भागामध्ये पाळत ठेवू लागला . काही दिवसांनी त्याला एक जटाधारी वृद्ध साधू महाराजांचे दर्शन झाले जे नदीच्या मध्ये असलेल्या गुहेतून बाहेर यायचे आणि सूर्याला नमस्कार करून पुन्हा आत मध्ये निघून जायचे . हळूहळू याला साधू महाराजांची वेळ माहिती झाली . अखेरीस एक दिवस याने महाराजांना गाठलेच ! हे थोर तपस्वी साधू पोपवंती नदीच्या पोटामध्ये असलेल्या एका गुहेत तपश्चर्या करत होते . हे इथे तपश्चर्या करत आहेत हे कोणालाच माहिती नव्हते . तसेच ते काही खात पीत देखील नसत . कमल ला माहिती झाल्यावर त्याने रोज त्यांच्यासाठी दूध फळे वगैरे आणायला सुरुवात केली . अशी अनेक वर्षे साधु महाराज त्या गुहेमध्ये तप करत होते . एकदा नर्मदेला महापूर आला त्याच्यामध्ये हा संपूर्ण परिसर जलमग्न झाला . त्यानंतर गुरुदेवांनी कमलला काही दर्शन दिले नाही . परंतु तिथून पुढे संकटकाळी त्याला ते प्रेरणा रूपाने मार्गदर्शन करायचे . त्यांचे नाव देखील कमलने कधी विचारले नव्हते . आज जेव्हा मी कमल ला रस्ता विचारला आणि कमलने जेव्हा माझी पुलाचा रस्ता सांगून बोळवण केली तेव्हा त्याला आतून मैय्याने प्रेरणा दिली की याला आपल्या नेहमीच्या मार्गाने नदी पार करव आणि आपली गुरु गुहा सुद्धा दाखव .
गुरुदेव गेल्यापासून कमल फारसा या रस्त्याने आलेला नव्हता . परंतु याच परिसरात लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला इथला दगड आणि दगड तोंडपाठ होता . त्याने मला सांगितले की रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये देखील हा ही नदी पार करू शकत होता ! कमल च्या मागे एक एक पाऊल टाकत मी चालू लागलो . पाण्यामध्ये काठी टेकल्यावर लक्षात येतसे की काठी संपूर्ण आत गेली तरी देखील पाणीच वाहतेच आहे इतके खोल प्रवाह होते ! कमलला विचारले की तो सांगायचा इथे पाणी १२ फूट खोल आहे इथे पाणी पंधरा फूट खोल आहे . म्हणजे थोडक्यात दगडांच्या सुळक्यांच्या टोकावरून आम्ही चालत होतो आणि दगडांच्या फटीं मधून नदी वाहत होती ! आणि पाण्याला वेग इतका होता की विचारू नका ! कमल काय बोलतो आहे ते देखील मला धड ऐकू येत नव्हते इतका पाण्याचा आवाज होता ! दगड प्रचंड शेवाळलेले होते . त्यामुळे पटापट चालणे आवश्यक होते . अधिक वेळ पाय एकाच जागी ठेवल्यावर सटकायला लागायचा . असे खोल खड्डे मध्ये असताना कमल मात्र अचानक एखाद्या ठिकाणी पाण्यात पाय ठेवायचा . तिथे मात्र नेमका खाली दगड असायचा . त्याला या नदीचे किती जबरदस्त ज्ञान आहे हे पाहून मला फार आश्चर्य वाटले . नदीचे दोन प्रवाह ओलांडल्यावर उजवीकडे एका जागी तो मला घेऊन गेला . इथे थोडेसे मातीने सपाट केलेले अंगण असल्यासारखे वाटले . एक मोठा औदुंबराचा वृक्ष या अंगणावर सावली धरून होता . दरम्यान मी या नदीचे पाणी प्यायलो आणि मला आश्चर्य वाटले ! प्रत्येक नदीच्या पाण्याला एक स्वतंत्र चव असते . परंतु पोपवंती नदीचे पाणी अगदी नर्मदा मैया च्या पाण्याच्या चवीचेच लागत होते ! कमल मला सांगू लागला की आपण आत्ता खाली उतरू शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह भयानक वाढलेला आहे . परंतु या अंगणासमोर ज्या दगडांच्या फटीतून आता पाणी बाहेर येत आहे तेच गुहेचे प्रवेशद्वार आहे ! याचा अर्थ आता आम्ही गुहेच्या टपावर उभे होतो . त्या भागामध्ये प्रचंड ऊर्जा मला जाणवत होत होती . मी त्याला विचारले की या नदीचे पाणी अगदी नर्मदेच्या चवीचे आहे ,ते कसे काय ! तेव्हा तो म्हणाला तीच तर गंमत आहे ! ही नदी सध्या कोरडी पडली असून हिच्यामध्ये बर्गी बांधाच्या कालव्याचे पाणी सोडल्यामुळे सध्या कमरे एवढे पाणी घेऊन वाहत आहे ! म्हणजे मी जे पाणी पिलो ते नर्मदेचेच पाणी होते तर ! आणि या अतिरिक्त पाण्यामुळेच ती गुहा दडली होती .  ते ठिकाण इतके दुर्गम होते की कोणालाही कधीही इथे कोणी राहत आहे याचा अंदाजच लागला नसता ! इथे राहणारे तपस्वी महाराज औदुंबराची फळे आणि नदीचे पाणी यावर जीवन कंठत असणार असा अंदाज मी लावला .  नर्मदा खंडामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत की जी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीत . रस्त्याने किंवा गावागावातून चालणाऱ्या परिक्रमा वासींना अशी ठिकाणे बघायला मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे कितीही कष्ट होऊ देत किंवा कितीही त्रास भोगाव लागू दे , नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही . असा सोपा नियम परिक्रमेमध्ये प्रत्येकाने पाळावा असे फार मनापासून वाटते . तिसरी धारा पार करण्यासाठी तुलनेने सर्वात कठीण होती . परंतु मार्ग दाखविणारा गुरू सोबत असेल तर त्याच्या मार्गाने जाणाऱ्या शिष्याला काहीही त्रास होत नाही याची अनुभूती घेत मी निघालो होतो . कमल शेतकरी तिथे माझ्यासोबत आला नसता तर मी लिहून देतो की ही नदी पार करण्याची हिंमत मी दाखवली नसती . किंवा आगाऊपणा करून जरी तसा प्रयत्न केला असता तर निश्चितपणे एखाद्या फटीमध्ये अडकून जलमग्न झालो असतो . नदी पार करे पर्यंत तिच्या तुषारां मुळे आणि फवाऱ्यांमुळे मी पूर्णपणे भिजलो होतो . मुळात ही नदी आहे साधीच . फक्त हा टापू ती प्रस्तर ओलांडत झेपावत वाहते . इथे तिचे पाणी तीन शाखांमध्ये विभागले गेल्यामुळे आणि दगडांच्या फटीमध्ये गायब होत असल्यामुळे तिला ओलांडणे शक्य होते . अन्यथा पाण्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे नदी सहजी ओलांडता येत नाही . कमलने आणि मी नदी पार गेल्यावर गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीला साष्टांग नमस्कार केला . कमल ची गुरुभक्ती मला फार भावली . आपला गुरु खरा का खोटा याची परीक्षा घेत बसणाऱ्या आधुनिक विचारसरणी च्या शिष्याधमांपेक्षा गुरुचे नाव देखील न विचारता केवळ त्याच्या उपदेशाचे पालन करणारा कमल सारखा शिष्य विरळाच ! कमलला माझ्याकडे नुकताच मिळालेला खाऊ देऊन टाकला . आणि पुढचा मार्ग समजून घेऊन पुढे निघालो . जी नदी पार करायला आम्हाला पंधरा मिनिटे लागली ते अंतर दोन मिनिटांमध्ये पार करून कमाल निघून गेला ! तो परत जाताना डाव्या हाताला ५० फूट खोल दरी होती आणि उजव्या हाताला कमरे एवढ्या पाण्याचा वेगवान प्रवाह होता . टोकदार दगडांवर पटापट उड्या मारत कमलने पैलतीर गाठला ! त्याचे शेतपलीकडे असल्यामुळे ह्या मार्गाने अक्षरशः तो हजारो वेळा गेलेला होता त्याचाच हा परिणाम . साधू महाराजांची गुफा बघावी असे मला फार वाटत होते . त्यामुळे मी धाडस करून खाली उतरलो . कमल म्हणाला त्याप्रमाणे जिथून गुहेमध्ये शिरायला मार्ग होता तिथून भसाभस पाण्याचा प्रवाह बाहेर येत होता . परंतु आत मध्ये गुहा असण्याची दाट शक्यता होती असे एकंदरीत सर्व लक्षणे सांगत होती . त्या अंगणातून महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि पुढचा मार्ग धरला . 
हा आहे नर्मदा पोपवंती संगम .नर्मदा नदीचा मोठा प्रवाह तर दिसतोच आहे . परंतु त्याने चंद्राकृती वाळूचे जे बेट तयार केले आहे ,त्यामुळे डावीकडून वाहणाऱ्या नर्मदेच्या छोट्या शाखेला जी मातकट रंगाची नदी येऊन मिळते आहे तीच पोपवंती नदी .
 पोपवंती नदी आम्ही जिथे ओलांडली ती जागा . पुढे मी मुत्तुर स्वामी आश्रम लिहिले आहे तिथे गेलो .
समोर नर्मदा संगम दिसतो आहे पहा ! 
हा संपूर्ण परिसर किती भयानक आहे याची कल्पना कदाचित हे उपग्रह मानचित्र पाहून वाचकांना येणार नाही . परंतु नदीमध्ये बर्गी धरणातून नर्मदेचे पाणी सोडल्यावर हा प्रवाह फारच भयानक पद्धतीने वाहतो .
आजचा दिवस धन्य होता ! पावला पावलावर साधू दर्शनाचा योग आज माझ्या नशिबात आहे याची मला कल्पनाच नव्हती ! हमीदपूर गावामध्ये मारुती मंदिराचा एक छोटासा पार आहे .तिथे आलो . इथे सावली होती म्हणून क्षणभर थांबलो . इतक्यात तिथे एक वैष्णव साधू माझ्या दिशेने येताना मला दिसले .  त्यांना मी नर्मदे हर केले असता त्यांनी नुसते दोन्ही हात वर केले ! साधु महाराज माझ्यासमोर आले . मी त्यांना दंडवत प्रणाम केला . त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकत होते . मी महाराजांना विचारले की महाराज इथून नर्मदे काठी जाण्याचा रस्ता कसा आहे ते कृपा करून मला सांगा . त्यांनी मला उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा शांत झाले . पुन्हा काहीतरी बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडू लागले आणि परत शांत झाले . मला खुणेने त्यांनी विचारले की तू इकडून कुठून आलास ? मी सांगितले की इथे पोपवंती नावाची एक नदी आहे ती पार करून मी आलेलो आहे . मला साधारण लक्षात आले की साधु महाराज बहुतेक मौनामध्ये आहेत . मी त्यांना विचारले की महाराज आपण मौनामध्ये आहात काय ? त्यांनी हो असे म्हणत होकारार्थी मान हलवली परंतु इतक्यात पुन्हा नाही असे म्हणत नकारार्थी मान देखील हलवली ! मला काही कळेना ! याचा अर्थ काय ? मी आता मौनाची भाषांतरे करायला सुरुवात केली ! मी त्यांना म्हणालो अच्छा म्हणजे तुमचे एरवी मौन नसते परंतु आज मौन व्रत आहे असे काही आहे का ?त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली . अखेरीस ते मला खुणेनेच म्हणाले रुको . मला काय वाटले कोणास ठाऊक , मी कमंडलू काढला आणि नर्मदा जल त्यांच्यापुढे धरले ! त्याबरोबर त्यांचा चेहरा आनंदाने फुलला ! कमंडलू मधील नर्मदा जल प्राशन केल्याबरोबर ते म्हणाले , "श्रीहरी . . . श्रीहरी . . . . श्रीहरी . . . .! आज मेरा . . . . मौन व्रत . . . . समाप्त हो गया . . . . . ! "  दोन शब्दांच्या मध्ये ते आठ दहा सेकंद थांबत होते . अनेक दिवसांच्या मौनाच्या अभ्यासानंतर आज ते मौनव्रत सोडत होते . मला तत्काळ परिस्थिती लक्षात आली आणि मी त्यांना म्हणालो , " महाराज जी ! आप कृपया कुछ बोलिये नही । मै आपसे प्रश्न पूछता हु । हा या ना मे आप जवाब दिजीये ।आपके लिए आसान और सही रहेगा । " स्वामीजींनी होकारार्थी मान हलवली . मी त्यांना विचारले की आपले खूप दिवसांचे मौनव्रत संपल्यामुळे आज आपल्याला बोलायची इच्छाच होत नाही असे काही आहे का ? साधुनी होकारार्थी मान हलवली . मी त्यांना विचारले की तुम्हाला मौन व्रत सोडल्यानंतर भेटलेला पहिला मनुष्य मीच आहे काय ? स्वामीजी हसले आणि पुन्हा त्यांनी होकारार्थी मान हलवली !  मी पुन्हा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला ! मी किती भाग्यवान होतो पहा ! नर्मदे काठी राहून तपस्या करणाऱ्या एका महान महात्म्याचे मौन व्रत संपल्यावरचे प्रथम शब्द ऐकण्याचे सद्भाग्य मला लाभले ! हळूहळू स्वामी बोलू लागले . त्यांचे नाव श्रीकृष्णदास होते आणि ते चित्रकुट मधील साधू होते . इथे पुढे लुचगाव नावाच्या गावामध्ये एक छोटीशी कुटी बांधून नर्मदे काठी हे वैष्णव साधू गेली अनेक वर्षे तपश्चर्या करत राहत होते . यांनी मला सांगितले की इथून पुढे ओळीने अनेक तपस्वी लोक राहत आहेत त्या सर्वांना भेटून तु पुढे जा . मी सर्वांची नावे आणि गावांची नावे वगैरे क्रमाने डायरीमध्ये लिहून घेतले . स्वामी महाराजांना अजूनही बोलायची इच्छा होत नव्हती ! हे खरे मौन ! नाहीतर मौन व्रत धारण करून हातवारे करून लोकांना भंडावून सोडणाऱ्या लोकांपेक्षा मौन व्रत संपलेले असून देखील बोलायची इच्छाच न होणे , हे मौन किती श्रेष्ठ दर्जाचे आहे याची अनुभूतीच मी जणु काही घेत होतो ! स्वामीजींकडे एक मोबाईल होता . ते मला म्हणाले की आपल्या दोघांचा एक फोटो काढ . असे स्वामीजी म्हणेपर्यंत तिथून एक शेतकरी निघाला होता त्याला मी आवाज दिला . त्यानेही लगेच आमचा फोटो काढला . पुढे स्वामींनी तो फोटो मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . वाचकांना या महात्म्याचे दर्शन व्हावे म्हणून तो फोटो सोबत जोडत आहे .
मौनव्रताचा त्याग केल्या केल्या श्रीकृष्णदास महाराजांचे दर्शन घेताना प्रस्तुत लेखक .
महाराज बाहेर निघाले असल्यामुळे त्यांची कुटी बंद होती अन्यथा कुटीमध्येच मला घेऊन गेलो असतो असे ते म्हणाले . परंतु त्यांच्या या कुटीचे दर्शन अलीकडेच मला ऑनलाईन झाले !
या श्रीकृष्णदास महाराजांविषयी युट्युब वर कोणीतरी एक व्हिडिओ बनवलेला आहे . तो योगायोगाने पाहाण्यात आल्यावर मला आठवले की यांचे दर्शन मला घडलेले आहे . त्या व्हिडिओमधील काही क्षणचित्रे आपल्यासाठी देत आहे . इथे आपल्याला त्यांची कुटी दिसत आहे . 
 लुचगाव आश्रमाचे चित्रकूट वाले बाबा अर्थात श्रीकृष्णदास महाराज
नर्मदा स्नान केल्यानंतरची महाराजांची प्रसन्न मुद्रा
आश्रमाच्या कट्ट्यावर बसून स्वयंपाक करताना चित्रकूट वाले बाबा . समोर वाहणारी नर्मदा मैया .
अशा महात्म्याच्या हातचे भोजन खायला मिळणे म्हणजे पर्वणीच !
चित्रकूट वाले बाबा नर्मदेची पूजा करताना
बाबांनी आपल्या कपाळावर लावलेले जे गंध आहे त्याला उर्ध्व पौण्ड्र असे म्हणतात . यातील पांढरा भाग म्हणजे आपल्या उपास्य देवतेच्या किंवा सद्गुरूंच्या पादुका आहेत अशी कल्पना केलेली असते . आणि त्यांना गंध लावलेले असते . दक्षिण भारतातील अय्यंगार लोक अशा प्रकारचे गंध सर्रास लावतात .  वैष्णव लोकांचा टिळा वेगळा असतो . शैवांचा वेगळा असतो . शाक्त , गाणपत्य , रामानंदी अशा प्रत्येक संप्रदायाचे टिळे लावण्याचे प्रकार वेगळे वेगळे असले तरी भावार्थ एकच आहे . विविधता मे एकता !
आपल्या आश्रमामध्ये हवन करत बसलेले चित्रकूट वाले बाबा . मागे अजून काही साधू .
साधूंना जे हवे ते सर्व जागेवर मिळते . कुठे जावे लागत नाही . 
 धुनीवर बसलेले चित्रकूट वाले बाबा
या श्रीकृष्णदास महाराजांनी मला सांगितले की इथून थोडेसे पुढे गेल्यावर एका कुटीमध्ये कर्नाटकातील एक संन्यासी राहतात त्यांचे दर्शन अवश्य घे . याच काठावर तप करणाऱ्या अजून काही साधकांची माहिती त्यांनी मला दिली आणि सर्वांचे दर्शन घेत पुढे जायला सांगितले . महाराजांना नर्मदे हर करून मी एका शेतातून मार्ग पकडला . अगदी जवळ जाईपर्यंत ही कुटी सापडत नाही . बागलकोट जवळ मुतुर नजिक गुळेतगुड नावाचे गाव आहे .इथले एक तरुण , कानडी भाषिक , तेजस्वी ,तरुण संन्यासी इथे साधना करण्यासाठी राहिलेले आहेत . अर्थात संन्यासी त्यांचे पूर्वाश्रमीचे मूळ स्थान कधी सांगत नाहीत . परंतु मीच आगाऊपणा करून ते शोधून काढले त्याबद्दल क्षमस्व ! यांचे नाव सिद्धारूढ स्वामी असे होते . अतिशय रम्य असा हा आश्रम होता . जागा जेमतेम दोन-तीन गुंठे असेल . परंतु घनदाट वनराजीने नटलेला आश्रम होता . अगदी मैय्याच्या काठावर होता . समोर मैया चे भव्य पात्र दर्शन देत होते . परिसरामध्ये भरपूर पक्षी किलबिलाट करत होते . एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम कसा असावा याची माझ्या मनामध्ये एक कल्पना होती त्याच्या खूप जवळ जाणारा हा आश्रम होता . 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ' या तुकोबारायांच्या ओळींची आठवण करून देणारे वातावरण होते ! शेजारी एक बंगलावजा कुटी होती . मी बाहेरून आवाज दिला नर्मदे हर ! आतल्या खोलीतून घंटा वाजवायचा आवाज आला . पुन्हा एकदा आवाज दिला . पुन्हा घंटा वाजली . मग माझ्या लक्षात आले की आपल्याला आत मध्ये कोणीतरी बोलवत आहे . आतल्या एका खोलीमध्ये स्वामीजी बसले होते आणि त्यांचा एका भक्तासोबत व्हिडिओ कॉल चालू होता . गंमत म्हणजे स्वामीजी पूर्णपणे मौनामध्ये होते . आणि पलीकडची माताराम त्यांच्याशी कानडी मध्ये बोलत होती . स्वामीजींनी कॅमेरा उलटा केला आणि त्या माताराम ला मी दिसू लागलो . तिने मोठ्या आनंदाने नर्मदे हर चा पुकारा केला ! मी देखील नर्मदे हर म्हणालो .त्या ताई कानडी मध्ये बोलत होत्या . मी तोडक्या मोडक्या कानडी मध्ये त्यांच्याशी संवाद साधला .पूर्वी कामानिमित्त वर्षभर म्हैसूर मध्ये मी राहिलो होतो . त्यामुळे जुजबी कानडी मला समजायचे .  त्यांनी मला सांगितले की महाराज मौनामध्ये आहेत . मी त्यांना महाराजांचे नाव विचारून घेतले . (आणि याच ठिकाणी गाव देखील विचारून घेतले ! ) तिने गाव सांगितल्यावर महाराज थोडेसे रागावल्यासारखे मोठे डोळे करून तिला गप्प बस अशी खूण करू लागले . मग मीच तिला सांगितले की साधूचे मूळ शोधायला जाऊ नये असे शास्त्र वचन आहे . किती हा आगाऊपणा माझा , परंतु माझ्या कडून घडला हे मात्र खरे ! मी महाराजांना सांगितले की मी बाहेर बसतो .आपले झाले की आपण बोलूया . महाराज खुणेनेच म्हणाले मी पण बाहेर आलो चला ! महाराजांची ती शिष्या त्यांना कानडी मध्ये काही शंका विचारत होती आणि महाराज मान हलवून हो किंवा नाही इतकीच उत्तरे तिला देत होते . लोक साधूला किती त्रास देतात याचे हे उत्तम उदाहरण मी पाहत होतो ! अर्थात त्यांना तो त्रास वाटत नाही .परंतु आपल्याला थोडेसे भान हवे की आपल्याला मनात आले की लगेच साधूला संपर्क साधून त्याच्या चाललेल्या साधनामध्ये व्यत्यय आपण शक्यतो आणू नये . महाराजांनी इथे एक सुंदर शिवलिंग स्थापन केले आहे . त्या कट्ट्यावर जाऊन मी निवांत बसलो . स्वामीजी देखील अतिशय निवांत होते .ते तिथेच पायऱ्यांवर येऊन खाली बसले . त्यांच्या त्या शिष्येने मला या परिसराची कानडी मध्ये माहिती दिली . मी आश्रमात आल्याचा स्वामींना खूप आनंद झालेला दिसत होता . स्वामिनी खुणेनेच मला सांगितले की तुला जेऊन जावे लागेल . मला थोडेफार कानडी बोलता येते हे पाहून स्वामींना आनंद वाटला . त्यांनी बाहेर कट्ट्यावर स्थापन केलेले शिवलिंग अतिशय सुंदर होते .  त्यावर शनीच्या कड्याप्रमाणे आडव्या रेषा होत्या . त्या रेषा आणि शिवलिंगाचा रंग हे अतिशय दुर्मिळ असतात असे स्वामींनी मला सांगितले . आणि मला देखील पुढे कुठेही असे शिवलिंग पुन्हा दिसले नाही .
हेच ते शिवलिंग
याच आसनावर मी बसून राहिलो होतो
इथे बसल्यावर आश्रम असा दिसायचा . हे स्वयंपाक घर होते जिथे स्वामींनी स्वयंपाक केला .
परिसरामध्ये गर्द झाडी होती
आश्रमातून नर्मदा मैया अशी दिसायची
संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी तळ ।कोकण किंवा कारवार प्रांतामध्ये जशी झाडे लावलेली असतात तशी झाडे लावली होती .कढीपत्ता ,केळी ,मसाल्याची झाडे , नारळी , पोफळी , फुलझाडे , वेली सर्व काही लावले होते . कमीत कमी जागेत अतिशय सुंदर आश्रम उभा राहिला होता . नंतर त्यांनी गच्चीवर नेऊन देखील मला काही झाडे दाखवली . आधी मला काय खायला हवे असे त्यांनी मला विचारले व मी तुमच्या आवडीचे काहीही चालेल असे म्हटल्यावर ,त्यांनी उत्तम पद्धतीची दाक्षिणात्य खिचडी बनवायचा बेत आखला . स्वामीजी हुशार होते . त्यांनी मला कुकरमध्ये खिचडी लावताना किती प्रमाणात पाणी घालायचे वगैरे सर्व शिकवले . न बोलता खाणा खुणांनीच शिकवले . आणि त्यांनी सांगितले की कुकर उतरल्यावर तुला झाकण दाखवतो . झाकणाला फोडणी लागलेली नसेल ! आणि खरोखरीच झाकणाला फोडणी लागली नव्हती इतक्या योग्य प्रमाणात खिचडीला आत मध्ये उकळी आली होती ! गॅसची ज्योत किती असावी पाणी किती असावे मसाला किती घालावा या सर्वांचे ठरलेले प्रमाण त्यांच्या डोक्यात होते ! बरबटलेले प्रेशर कुकर बघायची सवय आपल्याला असते . मला आज लक्षात आले की थोडेफार अनुभव ज्ञान लावले की कुकर खराब न करता भात करता येतो . बाहेर अंगणात बसवून त्यांनी मला भरपेट खिचडी खाऊ घातली . त्यावर गाईच्या साजूक तुपाची अक्षरशः धार लावली . मी आजपर्यंत इतकी अप्रतिम खिचडी खाल्ली नव्हती ! मी खिचडी खाऊन तिचे घासाघासा ला कौतुक करत असताना त्यांच्या डोळ्यातून गंगायमुना वाहत होत्या ! एका भुकेल्या जीवाला अन्न देऊन तृप्त करणे म्हणजे साक्षात परमेश्वराला तृप्त करणे असा भाव त्यांच्या ठायी होता . शिवाय मैय्याला नैवेद्य दाखवून मी भोजन करायचो . त्यामुळे मैय्याचे देखील तृप्तपणे भोजन झाले ! स्वामीजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ध्यान करायचे व नंतर एक तास फोनवर किंवा जे कोणी भेटायला येईल त्याच्याशी बोलायचे . इथे टकाचोर पक्षी खूप जवळ येऊन खिचडी खाऊन गेला . स्वामींनी सांगितले की हा रोज माझ्या हातून काहीतरी खाऊन जातो . इतक्यात कुत्र्याची अतिशय छोटी आठ पिल्ले तिथे आले . यांना आई नसल्यामुळे स्वामीजींनी त्यांचा सांभाळ केला होता . त्यांनी या पिलांना दूध भात कालवून खायला घातला . काही काळ मी या पिलांशी खेळत राहिलो . नंतर स्वामीजी मला आत मध्ये घेऊन गेले . यांच्याकडे वेदांताची व अन्य अध्यात्मिक विषयावरील अनेक पुस्तके होती . यांच्याकडे एक मोठी सेल्फी स्टिक होती ती त्यांनी मला दिली आणि आपल्या दोघांचा सेल्फी काढ असे मला सांगितले . मी देखील काही फोटो काढले . मित्राचा क्रमांक त्यांना लिहून दिला . त्यावर त्यांनी कालांतराने फोटो पाठविले . 
हमीदपूर येथील तरुण संन्यासी श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांचे समवेत प्रस्तुत लेखक
सिद्धारूढ स्वामी अतिशय तेजस्वी , नम्र , हुशार , सात्विक , मनमिळावू आणि विद्वान होते . यांचे गुरु श्री भागवतपदाचार्य स्वामी म्हणून होते .

आज इथेच मुक्काम कर म्हणून सिद्धारूढ स्वामी मला आग्रह करत होते . परंतु साधारण वैशाख महिन्या च्या आरंभी समुद्र पार करणाऱ्या नावा बंद होतात . त्यामुळे मला थांबून जमणार नव्हते . इथून पुढचे कुठलेही जादाचे मुक्काम टाळत गेलो आणि शक्य तितके चालत राहिलो . स्वामीजींनी मला काहीतरी भेटवस्तू द्यायची म्हणून पायात घुसलेला काटा काढण्याची अतिशय सुंदर आणि बारीक नाचकण भेट दिली ! त्यांनी ते हत्यार दिल्यावर मला आठवले की आज पर्यंत माझ्या पायात नर्मदा मातेच्या कृपेने काटाच घुसलेला नव्हता ! संपूर्ण परिक्रमा मार्ग कंटकाकीर्ण असून देखील हे होणे म्हणजे चमत्कारच मानला पाहिजे . इथून पुढचा नर्मदेच्या काठावरचा मार्ग अति धोकादायक होता . सर्व वाळूचा पहाड व त्यात अरुंद वाहून गेलेली पायवाट .गवत नाही ! काही नाही ! जरा पाय सुटला की मैया मध्ये पडणार हे निश्चित . त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच होती की हजारो नौका वाळू उपसात होत्या त्यामुळे कोणी ना कोणी वाचवायला नक्की आले असते . माणसांचा वावर येथे नसल्यामुळे काटेरी झाडे खूप होती . परंतु गमतीचा भाग असा की प्रत्येक धोकादायक ठिकाणी एखादे औदुंबराचे झाड असायचे .आणि त्याला धरून किंवा त्याच्या उघड्या पडलेल्या मुळ्या पकडून पुढे जायला मार्ग मिळायचा . औदुंबर वृक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की कितीही पाणी असते तरी तो सहसा मरत नाही . त्यामुळेच जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे जवळपास पाण्याचा स्त्रोत असण्याची शक्यता असते . जिथे भरपूर पाणी आहे अशाच ठिकाणी औदुंबराच्या बिया काही वर्षाने रुजतात . उभा कडा असल्यामुळे येऊन मिळणारे ओढे नाले हे खोल दरीतून यायचे . अशा खोल खड्ड्यांमध्ये उतरणे आणि पुन्हा चढणे अशक्य आहे . अशा ठिकाणी वेगाने पळत येऊन मोठी उडी मारून पलीकडे पोहोचणे हा एकमेव उपाय असायचा . अशा खूप उड्या या ठिकाणी मारल्या . उडी मारल्यामुळे दप्तराचा बंध ढीला पडण्याची शक्यता असायची . त्यामुळे आधी तो घट्ट पकडून मग उडी मारावी लागे . इथून पुढे एका टेकडावर छोटीशी कुटी बांधून एक तमिळ जोडपे राहत होते .त्याची माहिती मला श्रीकृष्णदास महाराजांनी दिली होती .परमज्योती अण्णा असे त्यांचे नाव होते . दिंडीगल हे त्यांचे गाव होते . याने आधी फारसे काही अगत्य दाखवले नाही . परंतु मी तमिळमध्ये बोलल्यावर घरातून बाहेर तरी आला . समोर एका मंदिरात पाच मिनिटे मी बसलो . फार काही बोलला नाही . निघताना मी त्याचा फोन क्रमांक डायरीमध्ये लिहून घेताना त्याचे नाव गाव तमिळमध्ये लिहून घेतले . ते पाहिल्यावर मात्र त्याला थोडासा पश्चाताप झाला . आणि काहीतरी खाऊन जा चहा पिऊन जा वगैरे सांगू लागला . परंतु मी एकदा आसन उचलले की शक्यतो काही घेत नसे . त्यामुळे नाव काढले आहेस तर एक ग्लासभर पाणी पाज असे त्याला म्हणालो . पाणी घेऊन पुढे निघालो . तमिळ लोकांमध्ये जाणीवपूर्वक केली काही दशके तिथल्या राजकारणी लोकांनी उर्वरित भारतातील लोकांच्या बद्दल अतिशय दूषित पूर्वग्रह करून ठेवलेला आहे . त्यामुळे त्यांच्याशी चालताना , वागताना , बोलताना वेगळ्या पद्धतीने सुरुवात करावी लागते , हे दुर्दैव आहे . पहिले वाक्य किमान तमिळमध्ये बोलावेच लागते . तरच ते तुम्हाला ऐकतात तरी . मी एक उत्तर भारतीय असून देखील (तमिळ लोक , तामिळनाडू प्रांत सोडून सर्वांना उत्तर भारतीय समजतात ) मला तमिळ लिहिता , वाचता , बोलता येते आहे याचे अप्रूप त्याला वाटले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता .इथे मैया चे खूप सुंदर वळण आहे . अतिशय स्वच्छ वाळूचा किनारा आहे . इथून रामगड व ग्वाडी ( ग्वारी ) गाव लागते . पुन्हा एकदा ग्वारी ! एकाच नावाची किती गावे आहेत पहा ! लुचगाव च्या समोर जो नाव घाट आहे तो लक्षात राहिला . मैय्यामध्ये इतक्या प्रचंड संख्येने नावा यापूर्वी कधी ही कुठेही नव्हत्या पाहिल्या . ग्वाडी गावामध्ये लोकांनी बोलवून चहा पाजला . ग्वारी गावचे महंत बाहेर गेलेले होते .परंतु नेमके वाटेमध्ये ते मला भेटले . गाडीवरून परत निघाले होते . त्यांनी परत आश्रमामध्ये चालण्याचा खूप आग्रह केला परंतु मी उलटे चालायला नको ,असे सुचविल्यावर ठीक आहे म्हणाले . इथे मला ताडाची बरीच झाडे दिसली .  त्यांच्याविषयी मी महंतांना माहिती दिली आणि पुढे निघालो . इथे एका अतिशय अप्रिय घटनेला मला सामोरे जावे लागणार होते . मैय्याला कदाचित हे आधीच माहिती असावे .त्यामुळे ती इथे खळाळून हसताना भासत होती . 


लेखांक सत्तावन्न समाप्त (क्रमशः )

लेखांक ५८ : गंजाल-गोमती-नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ

उमरिया गाव पार केले आणि इथून पुढे एक सलग शेतीचा पट्टा नर्मदा किनारी लागला . उजवीकडे शांतपणे वाहणारी नर्मदा होती . तिच्या समपातळीवर सलग शेती केली होती . हा पट्टा साधारण दोनशे फूट रुंदीचा असावा . त्यानंतर डाव्या हाताला वीस ते तीस फुटाचा मातीचा उंचवटा होता . आणि त्याच्यावर पुन्हा शेती चालू होत होती . यातील मी खालच्या शेतातून चालत होतो . प्रत्येक शेतामध्ये एक छोटीशी पायवाट असायची . खरे तर ही जमीन नदीपात्रातलीच असते . परंतु धरणातील पाण्याची पातळी कमी झाली की ही जमीन मोकळी पडून राहते .म्हणून वरती ज्यांची शेती आहे ते लोक त्यांच्या शेता समोर येणाऱ्या खालील भागात शेती करतात . कागदोपत्री बघायला गेले तर या जमिनीची मालकी कोणाकडेच नसते ,कारण हे प्रत्यक्ष नदीपात्रातले क्षेत्र आहे . परंतु त्यातून वादावादी भांडण नकोत म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने असा अलिखित ठराव पास केलेला आहे की ज्याचे वर शेत आहे त्यानेच खालचे नदीपात्रातले शेत कसायचे . तो थोडेफार पैसे घेऊन दुसऱ्या कोणाला देखील हे शेत कसायला देतो असे सुद्धा पाहायला मिळते . शेतामध्ये हिरवीगार पिके होती त्यामुळे चालताना पायाला खूप आनंद वाटत होता . हिरव्यागार पिकातून वाहणारा वारा पायांना गारवा देतो . चालून पाय कायम गरम होत असतात . अशा पिकावर पडलेले दवाबिंदू मग पायातील उष्णता कमी करायला मदत करतात . या पातळीवरून चालण्याचा फायदा असा की उजवीकडे नर्मदा मैया सतत तुम्हाला दिसत राहते . असे बरेच अंतर चाललो आणि पापन नावाच्या गावाच्या हद्दीत पोहोचलो . या गावाचे नाव प्रेम नगर असे सुद्धा आहे . मी आज पर्यंत मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःचा विवेक वापरून देखील अशी काळजी घेत आलो होतो की आपल्या पायाखाली शेतकऱ्याचे एकही रोप आले नाही पाहिजे . भले आपल्याला कितीही उशीर होऊ देत किंवा कितीही लांबचा वळसा पडू देत . त्याप्रमाणे काळजी घेत मी चालत होतो . पुढे गंजाल गोमती आणि नर्मदा या तिघींचा अतिशय विहंगम असा त्रिवेणी संगम आहे . आता लवकरच मी त्या संगमापाशी पोहोचणार होतो . सकाळपासून भरपूर चालणे झाले होते . या गावातील मशिदीतून दिली जाणारी बांग ऐकू आली . नर्मदेच्या पवित्र तटावर तो आवाज ऐकून थोडासा त्रास होत होता . कारण बांग देणारा मुल्ला ओरडून सांगत होता की अल्ला शिवाय दुसरा कुठला देव नाही . माझ्यासमोर तीन तीन जलदेवता साक्षात प्रकट असताना हे वाक्य पचणारे नव्हतेच ! परंतु मी मोठ्या आवाजात नर्मदेचे नामस्मरण करत चालत राहिलो . माझ्या मनात विचार आले कधीकाळी सिंधू नदीच्या काठावर देखील असेच आश्रम असतील ! असेच साधू , संत ,बैरागी , वितरागी ,तडी , तापसी , संन्यासी , साधक चालत असतील . तिथे देखील आश्रमामधून मंदिरांमधून मोठ्या प्रमाणात अन्नदान चालत असेल ! सहिष्णुतेचा भाव अंतःकरणात ठेवून त्या लोकांनी अरब देशांकडून आलेल्या काही टोळ्यांना आश्रय दिला .  आणि बघता बघता स्वतःचा भूभाग गमावून बसले . आज सिंधू नदीच्या काठावर कुठेही आरतीचा आवाज येत नाही . किंवा सिंधू नदीमध्ये कुठेही दिवा सोडला जात नाही . करोडो बकऱ्यांचे रक्त मात्र दर बकरी ईदला गटारांच्या माध्यमातून सिंधू नदीला प्राप्त होते . ती पवित्र नदी कायमची बाटली . तिचा अपराध एकच होता . ती स्वधर्माप्रती अत्यंत निष्क्रिय अशा हिंदू समाजाला पूज्य होती . जो समाज आपल्याला परम पवित्र असलेल्या मातेचे , देवतेचे , देवस्थानाचे , नदीचे , भूभागाचे , प्रांताचे ,व्यक्तीचे , आदर्शाचे ,संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही तो समाज हळूहळू अस्तंगत होतो हा जगाचा इतिहास आहे . सहिष्णुता कोणाला दाखवावी , आणि कोणी दाखवावी हा विवेकाचा विषय आहे . अहिंसा हे अष्टांग योगातील एक तत्व असले तरी देखील सीमेवर उभा असलेला शस्त्रधारी सैनिक जर त्या तत्त्वाचे पालन करू लागला तर तो त्याच्या क्षात्र धर्माचा धर्म द्रोही नाही का ठरणार ? हातामध्ये शल्य कर्माचे हत्यार घेतलेला शल्य विशारद डॉक्टर जर म्हणाला की मी माझ्या हाताने रक्तपात करणार नाही तर रुग्णाचा जीव वाचवू शकेल काय ? तात्पर्य पुस्तकातली नितीतत्वे प्रत्यक्ष आचरणात आणताना त्याला विवेकाची जोड असावीच लागते . हे सर्व चिंतन करत चालताना माझे पायाखाली येणाऱ्या प्रत्येक रोपाकडे लक्ष होते .
पुढे एक असे शेत लागले की ज्याच्यामध्ये प्रचंड चिखल माजवला होता . पाण्याच्या मोटर दुथडी भरून नर्मदेचे पाणी उचलत होत्या आणि शेत भरून ते पाणी पुन्हा नर्मदेमध्ये चालले होते . इथे पायाखाली रस्ता कुठे आहे ते शोधत चालताना तारांबळ होत होती . इतक्यात माझ्या अंगावर पाणी पडले म्हणून मी वर पाहिले . वरून एक शेतकरी माझ्या अंगावर ओरडत होता . छातीपर्यंत वाढलेली दाढी ,मिशांचा पत्ता नाही आणि डोक्यावर गोल जाळीदार टोपी असा त्याचा वेश होता . त्याने खूप गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्या देऊन माझ्या नावाने ओरडा सुरू केला . मला म्हणाला ताबडतोब उलटा फिर आणि इथून निघून जा ! ही माझी जमीन आहे ! मी अतिशय नम्रतेने हात जोडून त्याला म्हणालो की बाबा रे तुझ्या शेतातील एकाही रोपाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत घेतच मी चालत आहे . त्यामुळे चिंता करू नकोस . त्याने वरून पुन्हा माझ्या दिशेने काही मातीची ढेकळे फेकली . आणि पुन्हा खूप घाणेरड्या शिव्या देऊ लागला . मी तिथून वरती जाण्यासाठी एखादा मार्ग आहे का ते पाहत होतो . परंतु तसा काही मार्ग दिसला नाही . मी त्याला खालून ओरडून सांगितले की बाबा रे मी नर्मदा परिक्रमा वासी आहे . तुझ्या शेतामध्ये मला शून्य रस आहे . मी माझ्या माझ्या मार्गाने चाललो आहे . मला शांतपणे जाऊ दे .मी नर्मदेचे नाव काढल्याबरोबर तो अजूनच चवताळला . आणि अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये नर्मदा माते विषयी बोलू लागला . क्षमा करावी परंतु त्याचे शब्द मी इथे उधृत ही करू शकत नाही इतके ते विकृत होते . तो जोपर्यंत मला बोलत होता तोपर्यंत मी ऐकून घेत होतो . परंतु आता त्याने माझ्या आराध्य दैवताचा अपमान केला होता त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा मिळणे आणि तत्काळ मिळणे आवश्यक होते . तो अजूनही मातीची ढेकळे माझ्या अंगावर फेकतच होता .  दुर्दैवाने माझ्या  जवळपास त्याला फेकून मारता येईल असे काहीही मला सापडेना . सर्वत्र चिखलच चिखल माजवून ठेवला होता . मी त्याला म्हणालो की अरे जिच्या पात्रामध्ये शेती करून पोट भरतोस तिलाच असे बोलतोस ? कुठे फेडशील ही पापे ?ताबडतोब तिची माफी माग ! परंतु तो मनुष्य अजूनच घाण घाण बोलायला लागला . मला म्हणाला तुला मी आता सोडणार नाही . तुला माझ्या शेतातच संपवून टाकतो . बघू तुझी कुठली आई तुला वाचवायला येते . आता मात्र माझ्या संयमाचा बांध संपला . मी नर्मदा मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार केला . आणि सांगितले आता याच्यापुढे जे काही मी करेन त्याची जबाबदारी तुझ्याकडे लागली . त्याला आता मी जबाबदार नाही . तू जशी प्रेरणा देशील तसे आता होईल . आणि मी त्याच्या शेताच्या मधोमध येऊन उभा राहिलो . माझा दंड आडवा धरला आणि त्या नराधमाला ओरडून सांगितले . तुला शेवटची संधी आहे .तू नर्मदा मातेची माफी मागतोस की नाही तेवढे सांग . तो मला नाही मागणार माफी .  काय करशील ? माझ्यासमोर त्याचे काढणीला आलेले सुंदर असे गहू होते . गव्हाच्या लोंब्या अजून हिरव्या होत्या . अजून दोनच आठवड्यामध्ये नर्मदेचे पाणी पिऊन टपोरे झालेले त्याचे दाणे वाळायला सुरुवात होणार होती आणि मग त्या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळणार होते . पुन्हा एकदा माझे हिंदू मन कचरले . मी त्याला म्हणालो अरे वेड्या माफी मागून मोकळा हो ! कशाला  स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवतो आहेस ! त्याने पुन्हा अर्वाच्य भाषेमध्ये नर्मदा मातेला शिवीगाळ चालू केली . माझ्या उपास्य देवतेचा अपमान करून त्याला मूर्ती भंजनाचा आनंद मिळत होता . त्याने माझ्या श्रद्धास्थानावर विनाकारण आघात केलेला असल्यामुळे आता त्याला उत्तर देणे मला भाग होते . तमिळनाडूमध्ये सिलंबम् नावाची एक युद्ध कला आहे . हिला भारतातील सर्वात प्राचीन युद्ध कला मानतात आणि ती अन्य सर्व मार्शल आर्टस् ची जननी आहे . अगदी केरळचे कलरी पयट्टु देखील याच कलेतून निर्माण झाले आहे . यामध्ये दंड फिरविण्याचा विच नावाचा एक प्रकार आहे . याप्रकारे दंड फिरवताना साधारण तुमचे दोन्ही हात पसरल्यावर होणारी लांबी अधिक दोन दंड इतक्या व्यासाचे वर्तुळ तयार होते . म्हणजे सुमारे पंधरा फूट ! एवढ्या वर्तुळात कोणीही तुमच्या जवळ येऊ शकत नाही . आणि एवढ्या वर्तुळातील एकही गोष्ट तुमच्या तावडीतून सुटत नाही .
सिलंबम मधील विच हा प्रकार असा असतो . यामध्ये दंडाची गती इतकी अधिक असते की व्हिडिओच्या स्क्रीन शॉट मध्ये तो सापडत नाही . इतक्या वेगाने आघात झाल्यावर मध्ये येणारी प्रत्येक वनस्पती मानच टाकते . 

 त्याच्या दुर्दैवाने मी ही कला चांगली अवगत केलेली होती . अगदी तमिळनाडूमध्ये राहून "विच "  मी शिकलो होतो .
क्षणाचाही विचार न करता मी वेगाने माझा दंड फिरवायला सुरुवात केली आणि माझ्या आजूबाजूच्या पंधरा फूट परिसरातील गव्हाच्या हिरव्यागार लोंब्या कचाकच तुटून पडू लागल्या ! त्या माणसाने वरून आकांत चालू केला ! थांब !थांब ! नाहीतर तुझा जीव घेईन !अमुक करीन ! तमुक करीन ! परंतु मी काही त्याच्या फुसक्या धमक्यांना घाबरलो नाही आणि माझे काम चालूच ठेवले . काठी फिरवत फिरवत मी पुढे निघालो . आणि एखादा जेसीबी जशी जमीन साफ करतो तसे त्याचे उभे पीक आडवे होऊ लागले . मध्येच थांबून मी वरती बघायचो आणि ओरडायचो .बोल नर्मदे हर ! बोल नर्मदा माता की जय ! तो अजून शिव्या द्यायचा . मग मी पुन्हा माझा कार्यक्रम चालू करायचो . असे साधारण शंभर फूट चालू असेल . या पूर्ण पट्ट्यातील सगळे पीक मी आडवे झोपवले . वरती त्याने अक्षरशः अकांड तांडव चालवला . त्याला वरून खाली देखील येता येत नव्हते आणि काहीच करता येत नव्हते . खूप घाण घाण शिव्या तो देत होता . मी त्याला पुन्हा ओरडून सांगितले . जोपर्यंत तू नर्मदे हर म्हणत नाहीस आणि नर्मदा माता की जय म्हणत नाहीस तोपर्यंत तुझ्या पिकाचा एकही दाणा तुला मिळणार नाही याची खात्री मी देतो . तुझे सगळे पीक मी आज झोपवणार . तशी पण ही तुझ्या बापाची जागा नाही .ही माझ्या आईची जागा आहे . तो वरून गयावया करायला लागला . मी पुन्हा काठी फिरवयला चालू केली आणि म्हणालो बोल नर्मदे हर . अखेरीस आपले अतोनात नुकसान होत आहे आणि नर्मदे हर म्हटल्याशिवाय हा बाबा काही थांबत नाही हे पाहून वरून तो ओरडला . ठीक है । ठीक है । नर्मदे हर । मी म्हणालो सिर्फ नर्मदे हर नही चलेगा । नर्मदा मैया की जय बोल ! दोन्ही हात वर करून तो वरून ओरडला नर्मदा मैया की जय । 
थोडक्यात या जगामध्ये दुसरा देखील देव आहे हे त्याच्याकडून मान्य करून घेतले आणि मग मात्र मी माझा मार्ग धरून पुढे निघालो . मागे वळून माझ्यामुळे तुटलेल्या वनस्पतींची मी मनोमन क्षमा मागितली . परंतु माझ्यावर जळफळाट झालेला तो मनुष्य वरूनच माझ्या मागे मागे येतो आहे हे माझ्या लक्षात आले . आता पुढे जिथे कुठे हे दोन्ही रस्ते एकत्र येणार तिथे आमची चांगलीच जुंपणार होती . चालता चालता मी विचार करू लागलो की हे सर्व मी काय केले ? परंतु असे काही करणे माझ्या मूळ स्वभावातच नाही . त्यामुळे मला खात्री होती की हे नर्मदेने माझ्या हातून करून घेतले आहे . वेगाने चालत मी त्रिवेणी संगमाशी आलो . तोपर्यंत तो शेतकरी त्याच्या दोन तरुण मुलांना घेऊन खाली उतरताना मला दिसला . समोरची नदी खोल होती इतक्यात एक नाव माझ्या शेजारी येऊन थांबली आणि नावाडी मला म्हणाला , " जल्दी नैया मे कुद जाओ बाबा ! " जणू काही ती नाव माझ्यासाठीच तिथे येऊन थांबली होती अशा गतीने पुढे आम्ही मार्गस्थ झालो . माझी चालण्याची गती एक क्षणासाठी सुद्धा खंडित झाली नाही . नावेतून जाताना नावाडी मला सांगू लागला की तुमचा सर्व प्रकार मी पाण्यातून पाहत होतो . तुम्ही असे पहिले परक्रमावासी आहात की जे ह्या नालायक माणसाच्या शेतातून पार झालात . हा प्रत्येकाला त्याच्या शेतातून उलट परत पाठवतो .  वरून गोफणीने दगड फेकून मारतो . पाणी फेकून मारतो . मासे धरणाऱ्या लोकांना सुद्धा तो त्याच्या शेताला पाय लावू देत नाही . आता तुम्ही पटकन समोरची नदी चालत पार करा आणि गंगेसरी मठात जाऊन थांबा . तिथे याचे काही चालणार नाही . मी मनोमन म्हणालो याचे तसेही कुठेही चालणार नाही !  दुसरी नदी पार करत असताना मागून हे तिघे माझ्या नावाने खडे फोडत होते . मी मागे वळून पाहिले दोन्ही हात वर करून त्या तिघांना म्हणालो नर्मदे हर ! आज नर्मदेने त्याच्या अंगातील मस्तीचे हरण केले होते ! बहुतेक आयुष्यात पहिल्यांदाच तो नर्मदे हर आणि नर्मदा मैया की जय म्हणाला असावा . तो जोपर्यंत हे म्हणाला नसता तोपर्यंत त्याचे उभे पीक झोपवायचे ; मग माझे काहीही होऊ दे ,असे मी ठरवलेच होते . दोन्ही नद्यांचे पाणी प्यायला विसरलो नाही . गंजाल नदीचे पाणी खोल असले तरी अतिशय स्वच्छ असल्यामुळे तळाशी उगवलेली झाडे शेवाळे सर्व खूप सुंदर दिसत होते . गोमती नदी उथळ व गरम पाण्याची होती . वरती एका टेकाडावर आश्रम होतात तिथून एका भगवी लुंगी धारण केलेल्या तरुण साधूने मला आवाज दिला . धावतच मी तो आश्रम गाठला . आणि समोर जे काही पाहिले त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घडलेला अप्रीय प्रसंग मी क्षणात विसरून गेलो ! 
नागा साधूंसाठी परम आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रेय प्रभूंचे मंदिर असलेला हा बडा मठ होता . गंगेसरी आश्रम अथवा बडा मठ असे याचे नाव . मी जाता जाता त्या साधूला झालेला प्रकार सांगितला . तो म्हणाला काही काळजी करू नका . इथे कोणी येत नाही . मी म्हणालो मला काळजी करण्याचे काही कारण नाही कारण मी परिक्रमावासी आहे . परंतु तुम्हाला सांगितले कारण तुम्हाला या लोकांचा भविष्यात काही त्रास व्हायला नको . साधू मला म्हणाला मीच या आश्रमाचा महंत आहे . कोण काय करते ,तेच बघतो ! हा साधू स्वतः नागा साधू होता आणि नागा साधू अतिशय  निर्भय , निर्भीड आणि शूर असतात . त्यांना  कोणीही , कधीही , कुठेही अडवू शकत नाही . या महंतांचे नाव विष्णू भारती असे होते

इथे गंजाल नदी पापन गावाच्या हद्दी मध्ये आहे .गंजाल आणि गोमती नदीच्या मध्ये गोंदागाव नावाचे गाव आहे . आणि गोमती नदी नंतर अरिया बेदी गावचा गंगेसरी आश्रम आहे .समोर टिघाली नावाचा घाट आहे . त्या घाटावरून त्रिवेणी संगमांमध्ये स्नान करण्याकरता मोठ्या फेरीबोट मधून लोक बसून येतात .या बोटी इतक्या मोठ्या आहेत की त्यामध्ये चार ते पाच मोटार गाड्या देखील मावतात .
 टिघाली घाटावरून निघालेली फेरी बोट गंगेसरी कडे येताना
 हा अतिशय पवित्र त्रिवेणी संगम मानला जातो . बडा मठ अतिशय सुंदर आहे . वास्तु विशारद लोकांनी या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे . कारण अतिशय सुंदर वास्तुशिल्प कलेचा नमुना असलेला बडा मठ आणि त्यासमोर असलेल्या अनेक साधुसंतांच्या शेकडो वर्ष जुन्या पाषाणातील समाधी इतक्या नितांत सुंदर आहेत की त्याचे वर्णन मी तुम्हाला शब्दांमध्ये करून सांगू शकत नाही . आपल्याला साधारण या परिसराची कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरून सापडलेले काही फोटो सोबत जोडणार आहे ते पाहून आपल्याला मी काय म्हणतो आहे याची थोडीफार कल्पना येऊ शकते . इथले सर्वात सुंदर वास्तुशिल्प म्हणजे भगवान प्रभू दत्तात्रयाचे मंदिर आणि मठ हे असून समोर ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी आहे .  समाधी घेतलेले संत समाधी घेतल्यानंतर सहा महिने एका छिद्रातून दूध घेत होते असे इथे सांगतात .सर्व समाधी मंदिरे पुरातन व अप्रतिम मराठा शैलीची आहेत . दत्त मंदिर ही मला भेटलेले ते नागा साधू विष्णू भारती उत्तमपणे सांभाळत होते . त्यांच्या गुरुंचे नाव बाळकृष्ण जी भारती असे होते . त्यांनीच अलीकडच्या काळात हे सर्व पुन्हा मोठ्या वैभवाने उभे केले होते . या परिसरात काही ठिकाणी आढळणारे ग्रामस्थ ,गृहस्थ विरुद्ध साधू असे द्वंद्व इथे देखील आहे असे मला जाणवले . आपल्या धर्माला लागलेला हा शाप आहे .बहुसंख्या सज्जन लोक कधीच एकजुटीने राहत नाहीत , त्याचा फायदा मूठभर दुर्जन घेतात. अतिशय भव्य आणि सुंदर असे प्रवेशद्वार होते .प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या ओसरीमध्येच उतरण्याची सोय होती इतकी ती मोठी होती .मध्ये एक ऐस पैस चौक होता आणि आजूबाजूला तसेच माडीवर केलेले लाकडाचे कोरीव काम इतके आकर्षक आणि इतके मनमोहक होते की त्यामुळे या वास्तू कडे पाहतच राहावे असे कोणालाही वाटायचे . समोर दत्त मंदिर होते आणि बाजूला गुरूंची गादी होती . इथे आत मध्ये फक्त साधू संत राहू शकायचे आणि बाकीचे परिक्रमावासी ओसरीमध्ये उतरायचे . ओसरी मध्ये माझे सामान ठेवून मी समोर समाधी मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो . तोपर्यंत नागा साधूने मोठ्या आवाजात भजन कीर्तन लावून दिले जे समोरच्या बाजूला केलेल्या कर्ण्यामुळे उमरिया गावापर्यंत ऐकू जायचे ! मगाशी येताना देखील मी हेच तर कीर्तन ऐकत आलो हे मला आठवले ! याचा अर्थ मला त्रास देणाऱ्या शेतकऱ्याला देखील हे रोज ऐकावे लागत होते ! प्रवचनकार त्यामध्ये सांगत होते की अरे बाबांनो तुम्ही सगळे पूर्वी आमचेच होतात ! आपण सर्वजण एकच होतो . आमच्या पूर्वजांनी धाडस दाखवले आणि तुमच्या पूर्वजांनी कच खाल्ली म्हणून तुमच्यावर आज हे दिवस आलेले आहेत ! कल्पना करून पहा . हे दिवस-रात्र ऐकल्यावर ऐकणाऱ्या माणसाच्या मनस्थितीवर काय परिणाम होत असेल ! नागा साधूंची ही युक्ती मला भलतीच आवडली . इथे थोड्या वेळाने रस्ता मार्गाने चालत एकनाथराव रोकडे आणि शेळके महाराज वगैरे सर्व परिक्रमा वासी येऊन दाखल झाले . त्या सर्वांनी देखील ओसरी मध्येच आसन लावले . दत्तप्रभू आणि गुरु गादीचे चे दर्शन घेऊन समाधी मंदिरामध्ये गेलो . इथे अनेक छोट्या मोठ्या समाधी होत्या . इतकी मंदिरे बांधलेली असून देखील कुठेही सौंदर्यदृष्टीमध्ये हलगर्जीपणा केलेला नव्हता . ही सर्व मंदिरे दरवर्षी पाण्यामध्ये बुडतात तरी देखील त्याचा दगड देखील हललेला नाही इतके सुंदर बांधकाम होते . दगडांना सुरेख रंग देऊन त्यांचे आयुष्य वाढविण्यात आले होते . संपूर्ण दगडाचे मंदिर असल्यामुळे आत मध्ये अतिशय सुंदर आणि सुखद गारवा होता . संजीवन समाधी असल्यामुळे अतिशय जागृत स्थान होते . वयस्कर गावकरी फारसे आश्रमाशी जोडले गेलेले नसले तरी गावातील सर्व तरुण मात्र आश्रमामध्ये यायचे .आणि आरती वगैरे सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे . मी स्वतः इथे समाधीपुढे शंख फुंकला . इथे व्याघ्रासन ठेवलेले आहे . त्यावर ज्वारी फेकली की त्याच्या लाह्या व्हायच्या , इतकी ही जागा तपःपूत होती आहे असे मला सांगण्यात आले . अमृतानंद भारती महाराजांची ही ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी होती . दत्त मंदिराचा वाडा देखील मराठी पद्धतीचाच होता . अप्रतिम कलाकुसरीने बनविलेले जोडी जोडीने एकत्र उभे केलेले लाकडी खांब ,भव्य तुळया ,सुंदर लिंपलेल्या भिंती  हे सर्व महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने जपले होते . सर्वत्र रंगरंगोटी , टापटीप ठेवलेली होती . महाराज अतिशय मजबूत बांध्याचे होते . शक्यतो साधू थोडेसे कृष असतात परंतु हे महंत महाराज मात्र चांगले पैलवान होते .आपण या आश्रमाचे फोटो बघाच अशी आपल्याला विनंती आहे . 
गंगेसरी बडा मठ आश्रमाचे प्रवेशद्वार . इथे कट्ट्यावर देखील लोक झोपतात .
आश्रमाचा दरवाजा अतिशय सुंदर आहे . इथे जय विजय यांना उभे राहण्यासाठी जागा असून सुंदर दगडी महिरपी आपले स्वागत करतात . दरवाजासाठी आणि संपूर्ण बांधकामासाठी अतिशय उत्कृष्ट लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे .
दारातील ओसरी आणि येथील पडवी मध्ये मुक्काम करता येतो
आत मधला चौक अतिशय सुंदर असून वरती शिसम लाकडापासून घडविलेली सुंदर कलाकुसर असलेली माडी चित्ताकर्षक आहे .
सुंदर रीतीने घडविलेला हा दरवाजा पहा . असे एकापेक्षा एक सुंदर कलाकुसर असलेले लाकूड काम इथे आहे . इथे प्रत्येक गोष्ट जोडीने घडविलेली दिसते . खांब जोडीने आहेत .तशाच तुळया देखील जोडीने आहेत . अगदी महादेवापुढे नंदी देखील जोडीने आहे ! 
दत्तप्रभू आणि इतर देवता .
गुरु गादीचे दर्शन घ्या . इथेच ज्वारीच्या लाह्या व्हायच्या .
नुसते जवळ गेले तरी या जागेतील तपोबल जाणवत होते . 
आश्रमाच्या लाकडावरील सुंदर कोरीव काम . पुन्हा सर्व काही जोडीने ! 
आश्रम परिसरातून त्रिवेणी संगम असा दिसतो .
आश्रमाच्या बाहेर एक भव्य वृक्ष असून याच्या सावलीत बसून मैय्या कडे पाहायला खूप मजा येते .
गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगम
आश्रमाच्या बरोबर समोर असलेली समाधी मंदिरे
मंदिरे संपूर्ण दगडात बांधलेली असून उंच दगडी कट्ट्यावर सुबक कोरीव नक्षीकामात घडवलेली आहेत .
हे समाधी स्थळ असल्यामुळे येथे दशक्रिया विधी करायला परवानगी नाही अशी पाटी लिहिलेली आहे
शेजारी शेजारी अनेक मंदिरे असल्यामुळे कुठले दर्शन घेऊ आणि कुठले नाही असे होते
मंदिरांचे चबुतरे देखील असे शेजारी शेजारी आहेत
मंदिरांचे घुमट आणि कळस पाहण्यासारखे आहेत . बहुतांश मराठा पद्धतीचे बांधकाम आहे
आकर्षक रंगकाम केल्यामुळे मंदिराचे आयुष्य वाढले आहे व दुरून छान दिसतात
अमृतानंद जी भारती महाराज यांची संजीवन समाधी या मंदिरामध्ये आहे . 
मघाशी आपण बडा मठ इथले जोड खांब आणि जोड तुळया पाहिल्या ! आता गंमत पहा !
हे आहेत समाधी मंदिरातील जोड नंदिकेश्वर महाराज ! असा जुळा नंदी अन्यत्र कुठे पाहिल्याचे स्मरणात नाही . 
मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुंदर कलाकुसर असून पौराणिक प्रसंग दगडामध्ये चितारलेले आहेत
वास्तु विशारद ,स्थापत्य विशारद ,अभियंते , कलाकार ,चित्रकार या सर्वांना इथे भरपूर काही शिकायला मिळणार आहे असा हा संपूर्ण परिसर आहे . 
इथे अन्यही अनेक संतांच्या समाधी आहेत
मंदिराचे खांब आणि चबुतऱ्या वरील कलाकुसर देखील लक्षणीय आहे .
सहाशे वर्षे अनेक महापूर भूकंप आणि नैसर्गिक आपदांमध्ये टिकलेले हे बांधकाम असल्यामुळे याचे मी अगदी बारकाईने चहूबाजूने निरीक्षण करून घेतले . नर्मदा काठावरील माहेश्वर घाट सर्व वास्तू विशारदांमध्ये प्रसिद्ध आहे परंतु गंगेसरी घाटाबाबत फारसे कोणाला माहिती नाही ,म्हणून हा लेखन प्रपंच .
खांबांची संख्या भरपूर आहे . आणि आतला सुखद गारवा कोणालाही सहज आकर्षित करतो !
शेजारी वाहणारी नर्मदा माता .बांधकामाला धोका होईल म्हणून घराशेजारील महावृक्ष कापणाऱ्या महाभागांसाठी हे छायाचित्र मुद्दाम टाकले आहे . इतक्या जवळ महावृक्ष असून देखील मंदिराच्या बांधकामातील वीट देखील हललेली नाही याची कृपया नोंद घ्यावी . झाडांची मुळे पाण्याचा शोध घेत असतात त्यामुळे आपण निश्चिंत रहावे .
भारत हा मंदिरांचा देश आहे ! मंदिरे हे आपल्या संस्कृतीचे मानबिंदू आहेत ! त्यांचे जतन , संवर्धन आणि शास्त्रोक्त जीर्णोद्धार हे आपले जन्मदत्त कर्तव्य आहे !
मंदिर तुम्हाला एखाद्या घटनेचे किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या तत्त्वाचे सतत स्मरण करून देत राहते . विस्मरण होऊ देत नाही .
प्रत्येकाने आयुष्यात छोटेसे का होईना एखादे असे मंदिर उभे केले तरी ते पुढे हजारो वर्षे येणाऱ्या अनेक पिढ्यांना पथप्रदर्शक ठरलेल्या शंकाच नाही !
असो . रात्री इथे खूप सुंदर आरती व उपासना झाली . महंत महाराजांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली . सध्या समाजातील परिस्थिती काय आहे हे जर कुठल्या महंतांनी विचारले तर अभ्यासू वृत्तीच्या परिक्रमावासिनी अवश्य त्यांना योग्य ती माहिती पुरवावी . कारण साधू समाज अनेक कारणांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही . तिथपर्यंत पोहोच असलेल्या भक्त मंडळींनी त्यामुळे योग्य ती माहिती मागितल्यावर त्यांना दिली पाहिजे . पहाटे लवकर उठून निघालो . काल संध्याकाळी मला दिनेश कुमार नावाचा एक मनुष्य भेटून गेला होता आणि जाताना माझ्या शेतात येऊन जा असे त्याने सांगितले होते . त्याला असे वाटले होते की मी वरून जाणार आहे . परंतु मी पुन्हा एकदा किनाऱ्याचा मार्ग पकडल्यामुळे आणि त्याचे शेत अगदी किनार्‍या वर असल्यामुळे नेमके त्याच्या शेतातील कुटीतूनच मला जावे लागले . याचे वडील मला भेटून खूप आनंदले आणि त्यांनी अतिशय सुंदर असा काळा चहा करून मला पाजला . यांनी पूर्वी एक परिक्रमा केली होती .
दिनेश कुमार याची शेतातील छोटीशी झोपडी . मी गेलो तेव्हा सर्व शेती हिरवीगार होती .
 इथून थोडेसे पुढे गेल्यावर दिनेश कुमारच्या गुरुदेवांचा आश्रम होता . मी त्यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा त्याने प्रकट केली . त्याला नाही म्हणणारा मी कोण होतो त्यामुळे ताबडतोब त्याच्या मागोमाग निघालो . नर्मदेच्या काठाकाठाने चालून चालण्याची एक विशिष्ट शैली माझी माझी आपोआप विकसित झालेली होती . मला असे लक्षात आले की दिनेश कुमार अगदी त्याच पद्धतीने चालतो  . याचा अर्थ माझी शैली योग्य होती याची मला खात्री पटली . शैली म्हणजे गती कमी जास्त कुठे करायची , कुठे सावकाश चालायचे ,कुठे उड्या मारायच्या वगैरे सर्व गोष्टी . 
छिपानेर नावाचा प्रसिद्ध घाट नर्मदे काठी आहे . त्याच्या अलीकडे ब्रिजाखेडी नावाच्या गावामध्ये जगतारणघाट आहे . तिथे हे प्रेमदास नावाचे महाराज राहत होते . मी गेल्यावर त्यांना फार आनंद झाला ! त्यांनी विनाकारणच माझा फार मोठा आदर सत्कार केला ! मला खाण्यासाठी त्यांनी  चांदीच्या वाटीत सुकामेवा दिला ! बसण्यासाठी चांगले आसन दिले ! माझ्या लक्षात आले की आता काहीतरी वेगळे घडणार आहे ! आणि तसेच झाले ! महाराज मला म्हणाले की मी आता पाच दिवसांसाठी दिल्लीला जात आहे . आता तुम्ही असेच इथे निश्चिंत रहा ! तुम्ही कुठेही जायचे नाही . फक्त या तखतावर पडून राहायचे ! हा दिनेश कुमार आहे .असे माझे अनेक भगत इथे येतील जातील . तुम्हाला करून खायला घालतील . हात पाय पण चेपून देतील . परिक्रमा वासींना करून खायला घालतील . तुम्ही फक्त इथे बसून आशीर्वाद द्यायचा ! कॉर्पोरेट जगामध्ये एच आर मॅनेजर तुम्हाला जशा कंपनी बद्दलच्या आणि कामाबद्दलच्या फसव्या परंतु आकर्षक ऑफर देत असतो तशातला हा प्रकार होता ! मुळात मला नाव बंद होण्यापूर्वी समुद्रकिनारा गाठणे आवश्यक होते . मी अतिशय नम्रपणे परंतु ठामपणे महाराजांना नकार दिला . साधूंचे एक चांगले असते . तो जितका मुरलेला असतो तितका विरक्त असतो . क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला मोकळे केले ! दिनेश कुमार थोडे अंतर माझ्याबरोबर चालला आणि मी सांगितल्यावर परत माघारी गेला . याने मला शेतातून खाली उतरायची वाट कशी शोधायची ते शिकवले . नर्मदे काठी भेटलेला प्रत्येक मनुष्य तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. कधी कधी तर नर्मदा मैया देखील तुमची परीक्षा बघते की हा परिक्रमा करण्यासाठी निघाला आहे का महंती गाजवायला निघाला आहे ! माझा हेतू शुद्ध होता ! नर्मदा परिक्रमा ! नर्मदे हर !




लेखांक अठ्ठावन्न समाप्त (क्रमशः )

लेखांक ५८ : गंजाल-गोमती-नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ

उमरिया गाव पार केले आणि इथून पुढे एक सलग शेतीचा पट्टा नर्मदा किनारी लागला . उजवीकडे शांतपणे वाहणारी नर्मदा होती . तिच्या समपातळीवर सलग शेती केली होती . हा पट्टा साधारण दोनशे फूट रुंदीचा असावा . त्यानंतर डाव्या हाताला वीस ते तीस फुटाचा मातीचा उंचवटा होता . आणि त्याच्यावर पुन्हा शेती चालू होत होती . यातील मी खालच्या शेतातून चालत होतो . प्रत्येक शेतामध्ये एक छोटीशी पायवाट असायची . खरे तर ही जमीन नदीपात्रातलीच असते . परंतु धरणातील पाण्याची पातळी कमी झाली की ही जमीन मोकळी पडून राहते .म्हणून वरती ज्यांची शेती आहे ते लोक त्यांच्या शेता समोर येणाऱ्या खालील भागात शेती करतात . कागदोपत्री बघायला गेले तर या जमिनीची मालकी कोणाकडेच नसते ,कारण हे प्रत्यक्ष नदीपात्रातले क्षेत्र आहे . परंतु त्यातून वादावादी भांडण नकोत म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने असा अलिखित ठराव पास केलेला आहे की ज्याचे वर शेत आहे त्यानेच खालचे नदीपात्रातले शेत कसायचे . तो थोडेफार पैसे घेऊन दुसऱ्या कोणाला देखील हे शेत कसायला देतो असे सुद्धा पाहायला मिळते . शेतामध्ये हिरवीगार पिके होती त्यामुळे चालताना पायाला खूप आनंद वाटत होता . हिरव्यागार पिकातून वाहणारा वारा पायांना गारवा देतो . चालून पाय कायम गरम होत असतात . अशा पिकावर पडलेले दवाबिंदू मग पायातील उष्णता कमी करायला मदत करतात . या पातळीवरून चालण्याचा फायदा असा की उजवीकडे नर्मदा मैया सतत तुम्हाला दिसत राहते . असे बरेच अंतर चाललो आणि पापन नावाच्या गावाच्या हद्दीत पोहोचलो . या गावाचे नाव प्रेम नगर असे सुद्धा आहे . मी आज पर्यंत मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःचा विवेक वापरून देखील अशी काळजी घेत आलो होतो की आपल्या पायाखाली शेतकऱ्याचे एकही रोप आले नाही पाहिजे . भले आपल्याला कितीही उशीर होऊ देत किंवा कितीही लांबचा वळसा पडू देत . त्याप्रमाणे काळजी घेत मी चालत होतो . पुढे गंजाल गोमती आणि नर्मदा या तिघींचा अतिशय विहंगम असा त्रिवेणी संगम आहे . आता लवकरच मी त्या संगमापाशी पोहोचणार होतो . सकाळपासून भरपूर चालणे झाले होते . या गावातील मशिदीतून दिली जाणारी बांग ऐकू आली . नर्मदेच्या पवित्र तटावर तो आवाज ऐकून थोडासा त्रास होत होता . कारण बांग देणारा मुल्ला ओरडून सांगत होता की अल्ला शिवाय दुसरा कुठला देव नाही . माझ्यासमोर तीन तीन जलदेवता साक्षात प्रकट असताना हे वाक्य पचणारे नव्हतेच ! परंतु मी मोठ्या आवाजात नर्मदेचे नामस्मरण करत चालत राहिलो . माझ्या मनात विचार आले कधीकाळी सिंधू नदीच्या काठावर देखील असेच आश्रम असतील ! असेच साधू , संत ,बैरागी , वितरागी ,तडी , तापसी , संन्यासी , साधक चालत असतील . तिथे देखील आश्रमामधून मंदिरांमधून मोठ्या प्रमाणात अन्नदान चालत असेल ! सहिष्णुतेचा भाव अंतःकरणात ठेवून त्या लोकांनी अरब देशांकडून आलेल्या काही टोळ्यांना आश्रय दिला .  आणि बघता बघता स्वतःचा भूभाग गमावून बसले . आज सिंधू नदीच्या काठावर कुठेही आरतीचा आवाज येत नाही . किंवा सिंधू नदीमध्ये कुठेही दिवा सोडला जात नाही . करोडो बकऱ्यांचे रक्त मात्र दर बकरी ईदला गटारांच्या माध्यमातून सिंधू नदीला प्राप्त होते . ती पवित्र नदी कायमची बाटली . तिचा अपराध एकच होता . ती स्वधर्माप्रती अत्यंत निष्क्रिय अशा हिंदू समाजाला पूज्य होती . जो समाज आपल्याला परम पवित्र असलेल्या मातेचे , देवतेचे , देवस्थानाचे , नदीचे , भूभागाचे , प्रांताचे ,व्यक्तीचे , आदर्शाचे ,संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही तो समाज हळूहळू अस्तंगत होतो हा जगाचा इतिहास आहे . सहिष्णुता कोणाला दाखवावी , आणि कोणी दाखवावी हा विवेकाचा विषय आहे . अहिंसा हे अष्टांग योगातील एक तत्व असले तरी देखील सीमेवर उभा असलेला शस्त्रधारी सैनिक जर त्या तत्त्वाचे पालन करू लागला तर तो त्याच्या क्षात्र धर्माचा धर्म द्रोही नाही का ठरणार ? हातामध्ये शल्य कर्माचे हत्यार घेतलेला शल्य विशारद डॉक्टर जर म्हणाला की मी माझ्या हाताने रक्तपात करणार नाही तर रुग्णाचा जीव वाचवू शकेल काय ? तात्पर्य पुस्तकातली नितीतत्वे प्रत्यक्ष आचरणात आणताना त्याला विवेकाची जोड असावीच लागते . हे सर्व चिंतन करत चालताना माझे पायाखाली येणाऱ्या प्रत्येक रोपाकडे लक्ष होते .
पुढे एक असे शेत लागले की ज्याच्यामध्ये प्रचंड चिखल माजवला होता . पाण्याच्या मोटर दुथडी भरून नर्मदेचे पाणी उचलत होत्या आणि शेत भरून ते पाणी पुन्हा नर्मदेमध्ये चालले होते . इथे पायाखाली रस्ता कुठे आहे ते शोधत चालताना तारांबळ होत होती . इतक्यात माझ्या अंगावर पाणी पडले म्हणून मी वर पाहिले . वरून एक शेतकरी माझ्या अंगावर ओरडत होता . छातीपर्यंत वाढलेली दाढी ,मिशांचा पत्ता नाही आणि डोक्यावर गोल जाळीदार टोपी असा त्याचा वेश होता . त्याने खूप गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्या देऊन माझ्या नावाने ओरडा सुरू केला . मला म्हणाला ताबडतोब उलटा फिर आणि इथून निघून जा ! ही माझी जमीन आहे ! मी अतिशय नम्रतेने हात जोडून त्याला म्हणालो की बाबा रे तुझ्या शेतातील एकाही रोपाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत घेतच मी चालत आहे . त्यामुळे चिंता करू नकोस . त्याने वरून पुन्हा माझ्या दिशेने काही मातीची ढेकळे फेकली . आणि पुन्हा खूप घाणेरड्या शिव्या देऊ लागला . मी तिथून वरती जाण्यासाठी एखादा मार्ग आहे का ते पाहत होतो . परंतु तसा काही मार्ग दिसला नाही . मी त्याला खालून ओरडून सांगितले की बाबा रे मी नर्मदा परिक्रमा वासी आहे . तुझ्या शेतामध्ये मला शून्य रस आहे . मी माझ्या माझ्या मार्गाने चाललो आहे . मला शांतपणे जाऊ दे .मी नर्मदेचे नाव काढल्याबरोबर तो अजूनच चवताळला . आणि अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये नर्मदा माते विषयी बोलू लागला . क्षमा करावी परंतु त्याचे शब्द मी इथे उधृत ही करू शकत नाही इतके ते विकृत होते . तो जोपर्यंत मला बोलत होता तोपर्यंत मी ऐकून घेत होतो . परंतु आता त्याने माझ्या आराध्य दैवताचा अपमान केला होता त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा मिळणे आणि तत्काळ मिळणे आवश्यक होते . तो अजूनही मातीची ढेकळे माझ्या अंगावर फेकतच होता .  दुर्दैवाने माझ्या  जवळपास त्याला फेकून मारता येईल असे काहीही मला सापडेना . सर्वत्र चिखलच चिखल माजवून ठेवला होता . मी त्याला म्हणालो की अरे जिच्या पात्रामध्ये शेती करून पोट भरतोस तिलाच असे बोलतोस ? कुठे फेडशील ही पापे ?ताबडतोब तिची माफी माग ! परंतु तो मनुष्य अजूनच घाण घाण बोलायला लागला . मला म्हणाला तुला मी आता सोडणार नाही . तुला माझ्या शेतातच संपवून टाकतो . बघू तुझी कुठली आई तुला वाचवायला येते . आता मात्र माझ्या संयमाचा बांध संपला . मी नर्मदा मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार केला . आणि सांगितले आता याच्यापुढे जे काही मी करेन त्याची जबाबदारी तुझ्याकडे लागली . त्याला आता मी जबाबदार नाही . तू जशी प्रेरणा देशील तसे आता होईल . आणि मी त्याच्या शेताच्या मधोमध येऊन उभा राहिलो . माझा दंड आडवा धरला आणि त्या नराधमाला ओरडून सांगितले . तुला शेवटची संधी आहे .तू नर्मदा मातेची माफी मागतोस की नाही तेवढे सांग . तो मला नाही मागणार माफी .  काय करशील ? माझ्यासमोर त्याचे काढणीला आलेले सुंदर असे गहू होते . गव्हाच्या लोंब्या अजून हिरव्या होत्या . अजून दोनच आठवड्यामध्ये नर्मदेचे पाणी पिऊन टपोरे झालेले त्याचे दाणे वाळायला सुरुवात होणार होती आणि मग त्या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळणार होते . पुन्हा एकदा माझे हिंदू मन कचरले . मी त्याला म्हणालो अरे वेड्या माफी मागून मोकळा हो ! कशाला  स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवतो आहेस ! त्याने पुन्हा अर्वाच्य भाषेमध्ये नर्मदा मातेला शिवीगाळ चालू केली . माझ्या उपास्य देवतेचा अपमान करून त्याला मूर्ती भंजनाचा आनंद मिळत होता . त्याने माझ्या श्रद्धास्थानावर विनाकारण आघात केलेला असल्यामुळे आता त्याला उत्तर देणे मला भाग होते . तमिळनाडूमध्ये सिलंबम् नावाची एक युद्ध कला आहे . हिला भारतातील सर्वात प्राचीन युद्ध कला मानतात आणि ती अन्य सर्व मार्शल आर्टस् ची जननी आहे . अगदी केरळचे कलरी पयट्टु देखील याच कलेतून निर्माण झाले आहे . यामध्ये दंड फिरविण्याचा विच नावाचा एक प्रकार आहे . याप्रकारे दंड फिरवताना साधारण तुमचे दोन्ही हात पसरल्यावर होणारी लांबी अधिक दोन दंड इतक्या व्यासाचे वर्तुळ तयार होते . म्हणजे सुमारे पंधरा फूट ! एवढ्या वर्तुळात कोणीही तुमच्या जवळ येऊ शकत नाही . आणि एवढ्या वर्तुळातील एकही गोष्ट तुमच्या तावडीतून सुटत नाही .
सिलंबम मधील विच हा प्रकार असा असतो . यामध्ये दंडाची गती इतकी अधिक असते की व्हिडिओच्या स्क्रीन शॉट मध्ये तो सापडत नाही . इतक्या वेगाने आघात झाल्यावर मध्ये येणारी प्रत्येक वनस्पती मानच टाकते . 

 त्याच्या दुर्दैवाने मी ही कला चांगली अवगत केलेली होती . अगदी तमिळनाडूमध्ये राहून "विच "  मी शिकलो होतो .
क्षणाचाही विचार न करता मी वेगाने माझा दंड फिरवायला सुरुवात केली आणि माझ्या आजूबाजूच्या पंधरा फूट परिसरातील गव्हाच्या हिरव्यागार लोंब्या कचाकच तुटून पडू लागल्या ! त्या माणसाने वरून आकांत चालू केला ! थांब !थांब ! नाहीतर तुझा जीव घेईन !अमुक करीन ! तमुक करीन ! परंतु मी काही त्याच्या फुसक्या धमक्यांना घाबरलो नाही आणि माझे काम चालूच ठेवले . काठी फिरवत फिरवत मी पुढे निघालो . आणि एखादा जेसीबी जशी जमीन साफ करतो तसे त्याचे उभे पीक आडवे होऊ लागले . मध्येच थांबून मी वरती बघायचो आणि ओरडायचो .बोल नर्मदे हर ! बोल नर्मदा माता की जय ! तो अजून शिव्या द्यायचा . मग मी पुन्हा माझा कार्यक्रम चालू करायचो . असे साधारण शंभर फूट चालू असेल . या पूर्ण पट्ट्यातील सगळे पीक मी आडवे झोपवले . वरती त्याने अक्षरशः अकांड तांडव चालवला . त्याला वरून खाली देखील येता येत नव्हते आणि काहीच करता येत नव्हते . खूप घाण घाण शिव्या तो देत होता . मी त्याला पुन्हा ओरडून सांगितले . जोपर्यंत तू नर्मदे हर म्हणत नाहीस आणि नर्मदा माता की जय म्हणत नाहीस तोपर्यंत तुझ्या पिकाचा एकही दाणा तुला मिळणार नाही याची खात्री मी देतो . तुझे सगळे पीक मी आज झोपवणार . तशी पण ही तुझ्या बापाची जागा नाही .ही माझ्या आईची जागा आहे . तो वरून गयावया करायला लागला . मी पुन्हा काठी फिरवयला चालू केली आणि म्हणालो बोल नर्मदे हर . अखेरीस आपले अतोनात नुकसान होत आहे आणि नर्मदे हर म्हटल्याशिवाय हा बाबा काही थांबत नाही हे पाहून वरून तो ओरडला . ठीक है । ठीक है । नर्मदे हर । मी म्हणालो सिर्फ नर्मदे हर नही चलेगा । नर्मदा मैया की जय बोल ! दोन्ही हात वर करून तो वरून ओरडला नर्मदा मैया की जय । 
थोडक्यात या जगामध्ये दुसरा देखील देव आहे हे त्याच्याकडून मान्य करून घेतले आणि मग मात्र मी माझा मार्ग धरून पुढे निघालो . मागे वळून माझ्यामुळे तुटलेल्या वनस्पतींची मी मनोमन क्षमा मागितली . परंतु माझ्यावर जळफळाट झालेला तो मनुष्य वरूनच माझ्या मागे मागे येतो आहे हे माझ्या लक्षात आले . आता पुढे जिथे कुठे हे दोन्ही रस्ते एकत्र येणार तिथे आमची चांगलीच जुंपणार होती . चालता चालता मी विचार करू लागलो की हे सर्व मी काय केले ? परंतु असे काही करणे माझ्या मूळ स्वभावातच नाही . त्यामुळे मला खात्री होती की हे नर्मदेने माझ्या हातून करून घेतले आहे . वेगाने चालत मी त्रिवेणी संगमाशी आलो . तोपर्यंत तो शेतकरी त्याच्या दोन तरुण मुलांना घेऊन खाली उतरताना मला दिसला . समोरची नदी खोल होती इतक्यात एक नाव माझ्या शेजारी येऊन थांबली आणि नावाडी मला म्हणाला , " जल्दी नैया मे कुद जाओ बाबा ! " जणू काही ती नाव माझ्यासाठीच तिथे येऊन थांबली होती अशा गतीने पुढे आम्ही मार्गस्थ झालो . माझी चालण्याची गती एक क्षणासाठी सुद्धा खंडित झाली नाही . नावेतून जाताना नावाडी मला सांगू लागला की तुमचा सर्व प्रकार मी पाण्यातून पाहत होतो . तुम्ही असे पहिले परक्रमावासी आहात की जे ह्या नालायक माणसाच्या शेतातून पार झालात . हा प्रत्येकाला त्याच्या शेतातून उलट परत पाठवतो .  वरून गोफणीने दगड फेकून मारतो . पाणी फेकून मारतो . मासे धरणाऱ्या लोकांना सुद्धा तो त्याच्या शेताला पाय लावू देत नाही . आता तुम्ही पटकन समोरची नदी चालत पार करा आणि गंगेसरी मठात जाऊन थांबा . तिथे याचे काही चालणार नाही . मी मनोमन म्हणालो याचे तसेही कुठेही चालणार नाही !  दुसरी नदी पार करत असताना मागून हे तिघे माझ्या नावाने खडे फोडत होते . मी मागे वळून पाहिले दोन्ही हात वर करून त्या तिघांना म्हणालो नर्मदे हर ! आज नर्मदेने त्याच्या अंगातील मस्तीचे हरण केले होते ! बहुतेक आयुष्यात पहिल्यांदाच तो नर्मदे हर आणि नर्मदा मैया की जय म्हणाला असावा . तो जोपर्यंत हे म्हणाला नसता तोपर्यंत त्याचे उभे पीक झोपवायचे ; मग माझे काहीही होऊ दे ,असे मी ठरवलेच होते . दोन्ही नद्यांचे पाणी प्यायला विसरलो नाही . गंजाल नदीचे पाणी खोल असले तरी अतिशय स्वच्छ असल्यामुळे तळाशी उगवलेली झाडे शेवाळे सर्व खूप सुंदर दिसत होते . गोमती नदी उथळ व गरम पाण्याची होती . वरती एका टेकाडावर आश्रम होतात तिथून एका भगवी लुंगी धारण केलेल्या तरुण साधूने मला आवाज दिला . धावतच मी तो आश्रम गाठला . आणि समोर जे काही पाहिले त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घडलेला अप्रीय प्रसंग मी क्षणात विसरून गेलो ! 
नागा साधूंसाठी परम आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रेय प्रभूंचे मंदिर असलेला हा बडा मठ होता . गंगेसरी आश्रम अथवा बडा मठ असे याचे नाव . मी जाता जाता त्या साधूला झालेला प्रकार सांगितला . तो म्हणाला काही काळजी करू नका . इथे कोणी येत नाही . मी म्हणालो मला काळजी करण्याचे काही कारण नाही कारण मी परिक्रमावासी आहे . परंतु तुम्हाला सांगितले कारण तुम्हाला या लोकांचा भविष्यात काही त्रास व्हायला नको . साधू मला म्हणाला मीच या आश्रमाचा महंत आहे . कोण काय करते ,तेच बघतो ! हा साधू स्वतः नागा साधू होता आणि नागा साधू अतिशय  निर्भय , निर्भीड आणि शूर असतात . त्यांना  कोणीही , कधीही , कुठेही अडवू शकत नाही . या महंतांचे नाव विष्णू भारती असे होते

इथे गंजाल नदी पापन गावाच्या हद्दी मध्ये आहे .गंजाल आणि गोमती नदीच्या मध्ये गोंदागाव नावाचे गाव आहे . आणि गोमती नदी नंतर अरिया बेदी गावचा गंगेसरी आश्रम आहे .समोर टिघाली नावाचा घाट आहे . त्या घाटावरून त्रिवेणी संगमांमध्ये स्नान करण्याकरता मोठ्या फेरीबोट मधून लोक बसून येतात .या बोटी इतक्या मोठ्या आहेत की त्यामध्ये चार ते पाच मोटार गाड्या देखील मावतात .
 टिघाली घाटावरून निघालेली फेरी बोट गंगेसरी कडे येताना
 हा अतिशय पवित्र त्रिवेणी संगम मानला जातो . बडा मठ अतिशय सुंदर आहे . वास्तु विशारद लोकांनी या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे . कारण अतिशय सुंदर वास्तुशिल्प कलेचा नमुना असलेला बडा मठ आणि त्यासमोर असलेल्या अनेक साधुसंतांच्या शेकडो वर्ष जुन्या पाषाणातील समाधी इतक्या नितांत सुंदर आहेत की त्याचे वर्णन मी तुम्हाला शब्दांमध्ये करून सांगू शकत नाही . आपल्याला साधारण या परिसराची कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरून सापडलेले काही फोटो सोबत जोडणार आहे ते पाहून आपल्याला मी काय म्हणतो आहे याची थोडीफार कल्पना येऊ शकते . इथले सर्वात सुंदर वास्तुशिल्प म्हणजे भगवान प्रभू दत्तात्रयाचे मंदिर आणि मठ हे असून समोर ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी आहे .  समाधी घेतलेले संत समाधी घेतल्यानंतर सहा महिने एका छिद्रातून दूध घेत होते असे इथे सांगतात .सर्व समाधी मंदिरे पुरातन व अप्रतिम मराठा शैलीची आहेत . दत्त मंदिर ही मला भेटलेले ते नागा साधू विष्णू भारती उत्तमपणे सांभाळत होते . त्यांच्या गुरुंचे नाव बाळकृष्ण जी भारती असे होते . त्यांनीच अलीकडच्या काळात हे सर्व पुन्हा मोठ्या वैभवाने उभे केले होते . या परिसरात काही ठिकाणी आढळणारे ग्रामस्थ ,गृहस्थ विरुद्ध साधू असे द्वंद्व इथे देखील आहे असे मला जाणवले . आपल्या धर्माला लागलेला हा शाप आहे .बहुसंख्या सज्जन लोक कधीच एकजुटीने राहत नाहीत , त्याचा फायदा मूठभर दुर्जन घेतात. अतिशय भव्य आणि सुंदर असे प्रवेशद्वार होते .प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या ओसरीमध्येच उतरण्याची सोय होती इतकी ती मोठी होती .मध्ये एक ऐस पैस चौक होता आणि आजूबाजूला तसेच माडीवर केलेले लाकडाचे कोरीव काम इतके आकर्षक आणि इतके मनमोहक होते की त्यामुळे या वास्तू कडे पाहतच राहावे असे कोणालाही वाटायचे . समोर दत्त मंदिर होते आणि बाजूला गुरूंची गादी होती . इथे आत मध्ये फक्त साधू संत राहू शकायचे आणि बाकीचे परिक्रमावासी ओसरीमध्ये उतरायचे . ओसरी मध्ये माझे सामान ठेवून मी समोर समाधी मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो . तोपर्यंत नागा साधूने मोठ्या आवाजात भजन कीर्तन लावून दिले जे समोरच्या बाजूला केलेल्या कर्ण्यामुळे उमरिया गावापर्यंत ऐकू जायचे ! मगाशी येताना देखील मी हेच तर कीर्तन ऐकत आलो हे मला आठवले ! याचा अर्थ मला त्रास देणाऱ्या शेतकऱ्याला देखील हे रोज ऐकावे लागत होते ! प्रवचनकार त्यामध्ये सांगत होते की अरे बाबांनो तुम्ही सगळे पूर्वी आमचेच होतात ! आपण सर्वजण एकच होतो . आमच्या पूर्वजांनी धाडस दाखवले आणि तुमच्या पूर्वजांनी कच खाल्ली म्हणून तुमच्यावर आज हे दिवस आलेले आहेत ! कल्पना करून पहा . हे दिवस-रात्र ऐकल्यावर ऐकणाऱ्या माणसाच्या मनस्थितीवर काय परिणाम होत असेल ! नागा साधूंची ही युक्ती मला भलतीच आवडली . इथे थोड्या वेळाने रस्ता मार्गाने चालत एकनाथराव रोकडे आणि शेळके महाराज वगैरे सर्व परिक्रमा वासी येऊन दाखल झाले . त्या सर्वांनी देखील ओसरी मध्येच आसन लावले . दत्तप्रभू आणि गुरु गादीचे चे दर्शन घेऊन समाधी मंदिरामध्ये गेलो . इथे अनेक छोट्या मोठ्या समाधी होत्या . इतकी मंदिरे बांधलेली असून देखील कुठेही सौंदर्यदृष्टीमध्ये हलगर्जीपणा केलेला नव्हता . ही सर्व मंदिरे दरवर्षी पाण्यामध्ये बुडतात तरी देखील त्याचा दगड देखील हललेला नाही इतके सुंदर बांधकाम होते . दगडांना सुरेख रंग देऊन त्यांचे आयुष्य वाढविण्यात आले होते . संपूर्ण दगडाचे मंदिर असल्यामुळे आत मध्ये अतिशय सुंदर आणि सुखद गारवा होता . संजीवन समाधी असल्यामुळे अतिशय जागृत स्थान होते . वयस्कर गावकरी फारसे आश्रमाशी जोडले गेलेले नसले तरी गावातील सर्व तरुण मात्र आश्रमामध्ये यायचे .आणि आरती वगैरे सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे . मी स्वतः इथे समाधीपुढे शंख फुंकला . इथे व्याघ्रासन ठेवलेले आहे . त्यावर ज्वारी फेकली की त्याच्या लाह्या व्हायच्या , इतकी ही जागा तपःपूत होती आहे असे मला सांगण्यात आले . अमृतानंद भारती महाराजांची ही ६०० वर्षे जुनी संजीवन समाधी होती . दत्त मंदिराचा वाडा देखील मराठी पद्धतीचाच होता . अप्रतिम कलाकुसरीने बनविलेले जोडी जोडीने एकत्र उभे केलेले लाकडी खांब ,भव्य तुळया ,सुंदर लिंपलेल्या भिंती  हे सर्व महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने जपले होते . सर्वत्र रंगरंगोटी , टापटीप ठेवलेली होती . महाराज अतिशय मजबूत बांध्याचे होते . शक्यतो साधू थोडेसे कृष असतात परंतु हे महंत महाराज मात्र चांगले पैलवान होते .आपण या आश्रमाचे फोटो बघाच अशी आपल्याला विनंती आहे . 
गंगेसरी बडा मठ आश्रमाचे प्रवेशद्वार . इथे कट्ट्यावर देखील लोक झोपतात .
आश्रमाचा दरवाजा अतिशय सुंदर आहे . इथे जय विजय यांना उभे राहण्यासाठी जागा असून सुंदर दगडी महिरपी आपले स्वागत करतात . दरवाजासाठी आणि संपूर्ण बांधकामासाठी अतिशय उत्कृष्ट लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे .
दारातील ओसरी आणि येथील पडवी मध्ये मुक्काम करता येतो
आत मधला चौक अतिशय सुंदर असून वरती शिसम लाकडापासून घडविलेली सुंदर कलाकुसर असलेली माडी चित्ताकर्षक आहे .
सुंदर रीतीने घडविलेला हा दरवाजा पहा . असे एकापेक्षा एक सुंदर कलाकुसर असलेले लाकूड काम इथे आहे . इथे प्रत्येक गोष्ट जोडीने घडविलेली दिसते . खांब जोडीने आहेत .तशाच तुळया देखील जोडीने आहेत . अगदी महादेवापुढे नंदी देखील जोडीने आहे ! 
दत्तप्रभू आणि इतर देवता .
गुरु गादीचे दर्शन घ्या . इथेच ज्वारीच्या लाह्या व्हायच्या .
नुसते जवळ गेले तरी या जागेतील तपोबल जाणवत होते . 
आश्रमाच्या लाकडावरील सुंदर कोरीव काम . पुन्हा सर्व काही जोडीने ! 
आश्रम परिसरातून त्रिवेणी संगम असा दिसतो .
आश्रमाच्या बाहेर एक भव्य वृक्ष असून याच्या सावलीत बसून मैय्या कडे पाहायला खूप मजा येते .
गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगम
आश्रमाच्या बरोबर समोर असलेली समाधी मंदिरे
मंदिरे संपूर्ण दगडात बांधलेली असून उंच दगडी कट्ट्यावर सुबक कोरीव नक्षीकामात घडवलेली आहेत .
हे समाधी स्थळ असल्यामुळे येथे दशक्रिया विधी करायला परवानगी नाही अशी पाटी लिहिलेली आहे
शेजारी शेजारी अनेक मंदिरे असल्यामुळे कुठले दर्शन घेऊ आणि कुठले नाही असे होते
मंदिरांचे चबुतरे देखील असे शेजारी शेजारी आहेत
मंदिरांचे घुमट आणि कळस पाहण्यासारखे आहेत . बहुतांश मराठा पद्धतीचे बांधकाम आहे
आकर्षक रंगकाम केल्यामुळे मंदिराचे आयुष्य वाढले आहे व दुरून छान दिसतात
अमृतानंद जी भारती महाराज यांची संजीवन समाधी या मंदिरामध्ये आहे . 
मघाशी आपण बडा मठ इथले जोड खांब आणि जोड तुळया पाहिल्या ! आता गंमत पहा !
हे आहेत समाधी मंदिरातील जोड नंदिकेश्वर महाराज ! असा जुळा नंदी अन्यत्र कुठे पाहिल्याचे स्मरणात नाही . 
मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुंदर कलाकुसर असून पौराणिक प्रसंग दगडामध्ये चितारलेले आहेत
वास्तु विशारद ,स्थापत्य विशारद ,अभियंते , कलाकार ,चित्रकार या सर्वांना इथे भरपूर काही शिकायला मिळणार आहे असा हा संपूर्ण परिसर आहे . 
इथे अन्यही अनेक संतांच्या समाधी आहेत
मंदिराचे खांब आणि चबुतऱ्या वरील कलाकुसर देखील लक्षणीय आहे .
सहाशे वर्षे अनेक महापूर भूकंप आणि नैसर्गिक आपदांमध्ये टिकलेले हे बांधकाम असल्यामुळे याचे मी अगदी बारकाईने चहूबाजूने निरीक्षण करून घेतले . नर्मदा काठावरील माहेश्वर घाट सर्व वास्तू विशारदांमध्ये प्रसिद्ध आहे परंतु गंगेसरी घाटाबाबत फारसे कोणाला माहिती नाही ,म्हणून हा लेखन प्रपंच .
खांबांची संख्या भरपूर आहे . आणि आतला सुखद गारवा कोणालाही सहज आकर्षित करतो !
शेजारी वाहणारी नर्मदा माता .बांधकामाला धोका होईल म्हणून घराशेजारील महावृक्ष कापणाऱ्या महाभागांसाठी हे छायाचित्र मुद्दाम टाकले आहे . इतक्या जवळ महावृक्ष असून देखील मंदिराच्या बांधकामातील वीट देखील हललेली नाही याची कृपया नोंद घ्यावी . झाडांची मुळे पाण्याचा शोध घेत असतात त्यामुळे आपण निश्चिंत रहावे .
भारत हा मंदिरांचा देश आहे ! मंदिरे हे आपल्या संस्कृतीचे मानबिंदू आहेत ! त्यांचे जतन , संवर्धन आणि शास्त्रोक्त जीर्णोद्धार हे आपले जन्मदत्त कर्तव्य आहे !
मंदिर तुम्हाला एखाद्या घटनेचे किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या तत्त्वाचे सतत स्मरण करून देत राहते . विस्मरण होऊ देत नाही .
प्रत्येकाने आयुष्यात छोटेसे का होईना एखादे असे मंदिर उभे केले तरी ते पुढे हजारो वर्षे येणाऱ्या अनेक पिढ्यांना पथप्रदर्शक ठरलेल्या शंकाच नाही !
असो . रात्री इथे खूप सुंदर आरती व उपासना झाली . महंत महाराजांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली . सध्या समाजातील परिस्थिती काय आहे हे जर कुठल्या महंतांनी विचारले तर अभ्यासू वृत्तीच्या परिक्रमावासिनी अवश्य त्यांना योग्य ती माहिती पुरवावी . कारण साधू समाज अनेक कारणांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही . तिथपर्यंत पोहोच असलेल्या भक्त मंडळींनी त्यामुळे योग्य ती माहिती मागितल्यावर त्यांना दिली पाहिजे . पहाटे लवकर उठून निघालो . काल संध्याकाळी मला दिनेश कुमार नावाचा एक मनुष्य भेटून गेला होता आणि जाताना माझ्या शेतात येऊन जा असे त्याने सांगितले होते . त्याला असे वाटले होते की मी वरून जाणार आहे . परंतु मी पुन्हा एकदा किनाऱ्याचा मार्ग पकडल्यामुळे आणि त्याचे शेत अगदी किनार्‍या वर असल्यामुळे नेमके त्याच्या शेतातील कुटीतूनच मला जावे लागले . याचे वडील मला भेटून खूप आनंदले आणि त्यांनी अतिशय सुंदर असा काळा चहा करून मला पाजला . यांनी पूर्वी एक परिक्रमा केली होती .
दिनेश कुमार याची शेतातील छोटीशी झोपडी . मी गेलो तेव्हा सर्व शेती हिरवीगार होती .
 इथून थोडेसे पुढे गेल्यावर दिनेश कुमारच्या गुरुदेवांचा आश्रम होता . मी त्यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा त्याने प्रकट केली . त्याला नाही म्हणणारा मी कोण होतो त्यामुळे ताबडतोब त्याच्या मागोमाग निघालो . नर्मदेच्या काठाकाठाने चालून चालण्याची एक विशिष्ट शैली माझी माझी आपोआप विकसित झालेली होती . मला असे लक्षात आले की दिनेश कुमार अगदी त्याच पद्धतीने चालतो  . याचा अर्थ माझी शैली योग्य होती याची मला खात्री पटली . शैली म्हणजे गती कमी जास्त कुठे करायची , कुठे सावकाश चालायचे ,कुठे उड्या मारायच्या वगैरे सर्व गोष्टी . 
छिपानेर नावाचा प्रसिद्ध घाट नर्मदे काठी आहे . त्याच्या अलीकडे ब्रिजाखेडी नावाच्या गावामध्ये जगतारणघाट आहे . तिथे हे प्रेमदास नावाचे महाराज राहत होते . मी गेल्यावर त्यांना फार आनंद झाला ! त्यांनी विनाकारणच माझा फार मोठा आदर सत्कार केला ! मला खाण्यासाठी त्यांनी  चांदीच्या वाटीत सुकामेवा दिला ! बसण्यासाठी चांगले आसन दिले ! माझ्या लक्षात आले की आता काहीतरी वेगळे घडणार आहे ! आणि तसेच झाले ! महाराज मला म्हणाले की मी आता पाच दिवसांसाठी दिल्लीला जात आहे . आता तुम्ही असेच इथे निश्चिंत रहा ! तुम्ही कुठेही जायचे नाही . फक्त या तखतावर पडून राहायचे ! हा दिनेश कुमार आहे .असे माझे अनेक भगत इथे येतील जातील . तुम्हाला करून खायला घालतील . हात पाय पण चेपून देतील . परिक्रमा वासींना करून खायला घालतील . तुम्ही फक्त इथे बसून आशीर्वाद द्यायचा ! कॉर्पोरेट जगामध्ये एच आर मॅनेजर तुम्हाला जशा कंपनी बद्दलच्या आणि कामाबद्दलच्या फसव्या परंतु आकर्षक ऑफर देत असतो तशातला हा प्रकार होता ! मुळात मला नाव बंद होण्यापूर्वी समुद्रकिनारा गाठणे आवश्यक होते . मी अतिशय नम्रपणे परंतु ठामपणे महाराजांना नकार दिला . साधूंचे एक चांगले असते . तो जितका मुरलेला असतो तितका विरक्त असतो . क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला मोकळे केले ! दिनेश कुमार थोडे अंतर माझ्याबरोबर चालला आणि मी सांगितल्यावर परत माघारी गेला . याने मला शेतातून खाली उतरायची वाट कशी शोधायची ते शिकवले . नर्मदे काठी भेटलेला प्रत्येक मनुष्य तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. कधी कधी तर नर्मदा मैया देखील तुमची परीक्षा बघते की हा परिक्रमा करण्यासाठी निघाला आहे का महंती गाजवायला निघाला आहे ! माझा हेतू शुद्ध होता ! नर्मदा परिक्रमा ! नर्मदे हर !




लेखांक अठ्ठावन्न समाप्त (क्रमशः )

लेखांक ५९ : लछोरा येथील सौ. प्रतिभा सुधीर चितळे मैया यांची रेवाकुटी

२२-०२ -२०२२ ! आजचा आंग्ल दिनांक मजेशीर होता !
किनाऱ्याचा आजचा मार्ग खूपच दुर्गम आणि काटेकुटेयुक्त होता . मध्ये मध्ये मार्ग खंडित देखील झाला होता . तरीदेखील नेटाने चालत राहिलो . मध्ये येणारे ओढे नाले उड्या मारून किंवा पाण्यातून उतरून पार करत राहिलो .
याच भागातील नर्मदेला येऊन मिळणारा एक ओहोळ .
अखेरीस छोटी छीपानेर घाट आला .थोडे पुढे जाऊन मैया डावीकडे वळत होती . इथे उजव्या हाताला मोठा छीपानेर घाट आहे . हा घाट नावाप्रमाणेच छोटासा होता . परंतु गावातील वस्ती अधिक असल्यामुळे गजबजलेला काठ होता . मोठ्या संख्येने नावा असलेला हा घाट माझ्या लक्षात राहिला तो प्रामुख्याने गावकऱ्यांनी तयार केलेल्या तरंगत्या पुलामुळे ! इथे गावकऱ्यांनी एक फेरीबोट तयार केली होती जिला ते तैरता पूल म्हणायचे . एकावेळी चार-पाच मोठ्या गाड्या आणि काही लोक मावतील अशी त्याची रचना आणि क्षमता होती . 
 छोटी छीपानेर चा 'तैरता पूल '
या तरफ्यावर ट्रॉली सह एक ट्रॅक्टर आणि चार मोठ्या गाड्या आरामात बसलेल्या दिसतात पहा .
या तराफ्याची सतत ये जा सुरू असते
जिथे पूल बांधलेला नाही तिथे नदी पार करणाऱ्या लोकांना अशा साधनाशिवाय पर्याय उरत नाही .
हे त्याच भागातील एक छायाचित्र आहे . इथे वाळूमुळे पात्र विस्तीर्ण आणि उथळ आहे . तराफा चालतो त्या भागामध्ये मात्र खोली खूप जास्त आहे .
सडक मार्गाने परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींना मात्र दुर्दैवाने हा सुंदर छोटी छिपानेर घाट तीन किलोमीटर लांब पडतो .
या संपूर्ण टापू मध्ये बंगाली मुले आणि शेळके काका व रोकडे काका हे मला पुन्हा पुन्हा मुक्कामावर भेटत राहिले . त्याच्यावरून मी गणित लावायचो की नदीच्या काठाने मनुष्य लवकर पोहोचते का सडक मार्गाने . प्रत्येक वेळेस नदीच्या काठाने चालणारा मनुष्यच अधिक चालून देखील लवकर पोहोचतो असे आमच्या लक्षात आले . आमची सर्वांची साधारण चालण्याची गती एकसारखीच होती . नदी काठावरून जाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचे दर्शन , स्पर्शन , श्रवण सतत होत राहते .जे सडक मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी दुरापास्त आहे .
मार्गामध्ये महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन संचलित वेदपाठ शाळा आहे . 
श्रीकृष्ण सुदामा वगैरे मंडळी ज्या वेदपाठ शाळेमध्ये शिकली ती वेदपाठ शाळा उज्जैन नगरामध्ये आहे .सांदिपनी ऋषींच्या आश्रमामध्ये या सर्वांचे शिक्षण झाले . या आश्रमातर्फे चालविली जाणारी एक सुंदर विधवा शाळा येथे छोटी छीपानेर गावात बाहेरच्या बाजूला मैय्याकाठी दिसते .परंतु मला आज पायांना गती आल्यामुळे मी तिथे न थांबता पुढे गेलो . अजून थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक अतिशय सुंदर आश्रम दिसू लागला . घाटावर स्नान करणाऱ्या एका माणसाने आश्रम आवर्जून पाहून मगच पुढे जा असे सांगितले . जेव्हा नर्मदा नदीमध्ये उभा असलेला एखादा मनुष्य एखादा सल्ला द्यायचा तेव्हा तो मी मुकाटपणे ऐकायचो . हा आपल्यासाठी साक्षात नर्मदा मैया चा आदेश आहे असा माझा भाव असायचा . एका मोठ्या वटवृक्षाला ओलांडून पुढे गेल्यावर सुंदर असा वृक्षराजीने नटलेला आश्रम दिसू लागला . हा होता चिचोड कुटी गावातीलबजरंग दास महाराजांचा समाधी आश्रम .
श्री बजरंग दास महाराज समाधी आश्रम
आश्रमातील गर्द वृक्षराजी
आश्रमातील कमल कुटीर
बजरंग दास महाराज
आश्रमातील अन्य देवता
आश्रमामध्ये भरपूर बांधकामे होती व मागच्या बाजूला अशी चांगली निवास व्यवस्था साधुसंतांसाठी केलेली होती .
या आश्रमामध्ये अतिशय निरव शांतता होती . काही काळ मी सावली मध्ये बसलो परंतु कोणी आले नाही . नंतर मी आश्रमाचा परिसर फिरून पाहिला . इथे परिक्रमावासींनी परिक्रमेदरम्यान काय करावे आणि काय करू नये याचे खूप सुंदर नियम लावले होते . अखेरीस एक पंचा गुंडाळलेला साधू आला . मी कुठला काय चौकशी केल्यावर मराठी माणूस आहे ऐकल्यावर त्याने पुढच्या आश्रमात जा तिथे सर्व व्यवस्था होते असे मला सांगितले . मी त्याला आश्रमामध्ये येण्याचा माझा हेतू सांगितला . मला मुक्काम करायचा नसून फक्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते व क्षणभर विसावा घ्यायचा होता हे सांगून पुढे निघालो . पुन्हा काठा काठाने रस्ता शोधत पाय गतिमान झाले .
छीपानेर चा मोठा पूल खालून पार केला .
 छीपानेर चा पूल
 आता मैयाचे पात्र चांगलेच विस्तीर्ण झाले . आणि वाळूचे प्रमाण खूप वाढले . ही वाळू एकसारखी बारीक नव्हती तर खडे दगड मिश्रित असल्यामुळे बांधकामासाठी बिनकामाची होती .
ओबडधोबड खडक , वाळू आणि भूभागामुळे नर्मदेचे पात्र इथे वेड्यावाकड्या आकारात वाहते . त्यामुळे सलग एका रेषेत काठावरून जाण्याचा आनंद घेता येत नाही . बऱ्याचदा पुढे जाऊन पुन्हा उलटे माघारी येऊन चालावे लागते .परंतु त्यात सुद्धा आनंद आहे कारण मैया सतत शेजारी असते !
 समोर मैया चा एक मोठा प्रवाह अचानक डावीकडे वेगाने खाली वाहताना दिसला . याला प्रचंड खळखळाट होता ! इथे काही बगळे वेगाने येणाऱ्या पाण्यातील भांबावलेले मासे मटकावण्याचे काम करत बसले होते . 
हाच तो वेगवान डावीकडे वळलेला नर्मदेचा प्रवाह . बाकी नर्मदा डावीकडे दिसणारी उंच झाडे आणि उजवीकडे पुसट दिसणारी झाडांची रेषा याच्यामधून सरळ वाहते आहे .
मी इथून पुढे जाणार होतो इतक्या डावीकडे टेकाडावर एक भगवा झेंडा दिसला . या भागामध्ये शक्यतो पांढरे किंवा लाल झेंडे वापरतात . निखळ भगवा झेंडा फारसा दिसत नाही . वरती काय आहे पहावे तरी असा विचार करून मातीचा चढाव चढून  एका शेतातून वर गेलो .
 नर्मदापात्रातून वर येताना आश्रम असा दिसतो
 शेतामध्ये चार कुत्री होती ती सर्वजण एकदम माझ्या अंगावर धावून आली . झाडाखाली शेतकरी झोपला होता .मी आरडाओरडा करून त्याला जागे केले . त्याने देखील धावत येऊन माझ्याकडील काठी घेऊन सर्व कुत्र्यांना पळवून लावले . मालकाने हाकलले आहे कळल्यावर कुत्री शांत झाली . मग त्याने मला सांगितले की इथे समोर एक आश्रम आहे तो तुम्हाला दाखवतो . आणि चिखलाने माखलेल्या शेतातून मला आश्रमाच्या दारासमोर तो घेऊन आला . आश्रम छोटासाच पण अतिशय सुंदर होता .
चितळे मैया यांची लछोरा गावातील रेवा कुटी
 मी दारामध्ये उभा राहून नर्मदे हर असा पुकारा केला . एक तेजस्वी युवक धावतच बाहेर आला आणि मला म्हणाला , "नर्मदे हर बाबाजी । अंदर आईये । " आश्रमाच्या आत मध्ये एम एच १२ पासिंग ची एक गाडी उभी होती .युवक गोरापान आणि घाऱ्या डोळ्यांचा होता . त्याने पांढरे शुभ्र कपडे घातले होते . दाढी वाढली होती . आणि प्रकृती काटक होती . ये गाडी पुणे की है ना ? मी विचारले . "जी बाबाजी । पुना के कुछ परिक्रमावासी आये हुए है । " " बहुत अच्छी बात है । " असे म्हणत मी आश्रमाच्या ओवरीमध्ये झोळी उतरवली . माझ्या आधी काही परिक्रमा वासी येऊन बसलेले आहेत असे माझ्या लक्षात आले . बघतो तर सुमन मुजुमदार ! 
 लछोरा आश्रमामध्ये येऊन बसलेला सुमन मुजुमदार
दोघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली ! नर्मदे हर ! पुण्यावरून कोण आले आहे याची चौकशी केली असता विवेक पंडित नावाचे प्रभात रस्त्याला राहणारे एक सॉफ्टवेअर इंजिनियर भेटले .जे अमेरिकेमध्ये ओरॅकल कंपनीमध्ये नोकरी करत होते .ते सपत्नीक गाडीने परिक्रमाला निघाले होते .आणि भोजन घेण्याकरता इकडे आले होते . ओसरी मध्ये बसून त्यांच्याशी गप्पा मारू लागलो . विवेक पंडित यांनी त्यांचे मित्र रवी गोडबोले यांच्यासोबत यापूर्वी ९६ दिवसाची पायी परिक्रमा केलेली होती . या परिक्रमे मध्ये महाराजपुर पासून पोटात दुखायला लागल्यामुळे रवी गोडबोले यांना परिक्रमा अर्धवट सोडून गाडीने पुढे जावे लागले होते . परंतु विवेक पंडित यांची परिक्रमा चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेली होती .त्यानंतर अमेरिकेला नोकरीसाठी असताना त्यांनी शुलपाणीच्या झाडीमध्ये लोकांना देण्यासाठी सुमारे ५० ते ६० किलो कपडे गोळा केले होते आणि ते कपडे वितरित करण्याकरता यावेळी ते गाडीने सपत्निक परिक्रमेसाठी आलेले होते . 
आपल्या ९६ दिवसाच्या परिक्रमेचा अनुभव श्री पंडित यांनी सुंदर शब्दात शब्दबद्ध केलेला आहे . त्यांचे त्या परिक्रमेच्या शेवटी घेतलेले छायाचित्र .
परिक्रमा संपल्यावर घरी डावीकडून सौ विजया गोडबोले , श्री रवी गोडबोले , श्री विवेक पंडित आणि सौ वसुधा पंडित . सर्व चित्रे श्री विवेक पंडित लिखित नर्मदा परिक्रमा : एक स्वानुभव या अप्रतिम अनुभव कथन लेखनातून साभार .
गेल्या परिक्रमेच्या वेळी उत्तर तटावर असलेल्या चितळे मैया यांच्या जुन्या आश्रमामध्ये जाण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होती . नेमावर गावाच्या अलीकडे दोन किलोमीटर वर हा आश्रम होता . परंतु त्यावेळेस त्या आश्रमाच्या आधी असलेल्या काली पगडी वाले बाबा यांच्या आश्रमामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि सकाळी पुढे निघून नेमावरला आल्यावर चितळे मैय्यांना फोन केला की आम्हाला तुमचा आश्रम बघायचा आहे . तेव्हा त्यांना कळाले की काल ते चितळे मैया यांच्या आश्रमावरूनच पुढे आलेले आहेत . त्यावेळी परत उलटे फिरता येणार नाही म्हणून स्वतः चितळे दांपत्य नेमावर मध्ये येऊन यांची भेट घेऊन परत गेले होते . त्यावेळेस चितळे मैया यांचा आश्रम पाहण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याकरता या खेपेस हे लछोरा गावातील या नवीन आश्रमात आलेले होते ! आमच्या गप्पा ऐकत
एक छोटीशी अतिशय गोड आणि चुणचुणीत मुलगी तिथे इकडून तिकडे धावपळ करत होती . तिने धावतच आत मध्ये जाऊन तिच्या बाबाला वर्दी दिली . "अरे बाबा हे परिक्रमावासी सुद्धा मराठी बोलत आहेत ! " माझे मगाशी ज्याने स्वागत केले तो तरुण बाहेर आला आणि म्हणाला , " आपण सुद्धा मराठी आहात काय बाबाजी? " "हो दादा .मी पुण्याचा आहे . मी सांगितले . " मी त्याला विचारले , " हा तुमचा आश्रम आहे का ? " " नाही हा चितळे मैय्यांचा आश्रम आहे " तरुण उत्तरला . हा होता नवी मुंबई खारघर येथे राहणारा चेतन जोशी .नात्याने हा चितळे मैया यांचा पुतण्या लागत होता . खरे सांगायचे म्हणजे मी नर्मदा परिक्रमा कशी करतात , कधी सुरू करतात , कोणी करावी ,सोबत काय काय साहित्य घ्यावे ,काय काय तयारी करावी ,यापैकी काहीही , कुठेही , कधीही वाचलेले नव्हते .त्यामुळे मला युट्युब वर चितळे मैया यांचे अतिशय प्रसिद्ध असलेले नर्मदा परिक्रमेविषयीचे व्हिडिओ अजिबात माहिती नव्हते . हे विशेषत्वाने नमूद करतो . त्यामुळे मी त्याला सहजतेने विचारले , "कोण चितळे मैय्या ? " मला चितळे मैया माहिती नाहीत हे लक्षात आल्यावर चेतनने मला त्यांचे व्हिडिओ , त्या व्हिडिओमुळे प्रेरणा घेऊन परिक्रमा उचलणाऱ्या लोकांची संख्या वगैरे सर्व माहिती विस्तारपूर्वक सांगितली . नंतर अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! प्रशांत चन्ने नावाचा माझा एक सहकारी मित्र होता . जो सतत दिवस रात्र चितळे मैया यांचे युट्युब वरील व्हिडिओ ऐकायचा . झपाटल्यासारखे ऐकायचा . परंतु त्याने मला त्यांचे नाव घेऊन कधी सांगितले नव्हते . तर तो फक्त एक मराठी काकू छान बोलतात असे सतत सांगायचा . चेतन ने सांगितल्यावर माझ्या लक्षात आले की ह्याच त्या चितळे मैया ! इथे अजूनही काही मराठी बोलणाऱ्या माताराम आलेल्या होत्या . योगायोगाने या सर्वजणी पुण्याच्याच होत्या आणि त्या सर्वजण एकेक करून बाहेर येऊन मला भेटून गेल्या . मीरा गडकरी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणाऱ्या एक कोथरूड येथील माताराम होत्या . अलका राजपुरोहित म्हणून एक होत्या . आणि रूपाताई एक होत्या .या सर्वांची .आत मध्ये स्वयंपाकाची गडबड चालली होती . चेतनाच्या त्या छोट्या मुलीचे नाव अन्वी असे होते . आणि तिची नेहमीप्रमाणे आल्या आल्या माझ्याशी गट्टी जमली ! ही अतिशय सुंदर गाणी म्हणायची . आणि हे पाठांतर देखील जबरदस्त होते . तिने आल्या आल्या मला काही गाणी म्हणून दाखवली . सुमन मुजुमदार युकेलेलो वाद्य घेऊन आलाच होता .ते काढून मग आम्ही दोघांनी पुन्हा एकदा भजन सुरू केले ! भजन केल्याशिवाय भोजन घेणे हे पाप कर्मच वाटू लागले होते ,अशी काहीशी अवस्था झाली होती खरी! 
सुमन गाणी म्हणत असताना चेतन जोशी त्याचे फोटो काढत होता आणि व्हिडिओ घेत होता . ते त्याच्याकडून नुकतेच प्राप्त झाले .
छोटी अन्वी देखील आता आम्हाला सामील झाली आणि तिने खणखणीत आवाजात सुस्पष्ट उच्चारांमध्ये शंकराचार्यांनी लिहिलेले नर्मदाष्टक म्हणून दाखवले ! अजूनही छान छान गाणी तिने गायली ! आम्ही देखील मग गाणी म्हणू लागलो आणि सगळीकडे संगीतमय वातावरण झाले ! चेतन या सगळ्यांचे व्हिडिओ घेत होता . आपल्या माहिती करता ते सोबत जोडत आहे .


अन्वी चित्रकलेची वही घेऊन आली आणि तिला कुठले कुठले प्राणी हवेत त्यांची नावे मला पटापट सांगू लागली .मी देखील जमेल तितक्या गतीने तिला सर्व चित्रे काढून दिली .  लहान मुलांना चित्रे काढायला सांगणे हा माझा आवडता छंद आहे . मुले कुठली चित्रे /प्राणी काढायला लावतात यावरून त्यांची विचार क्षमता आणि झेप किती आहे याचा साधारण अंदाज येतो .


हळूहळू आमची गाडी पुन्हा एकदा बंगाली गाण्यांवर घसरली . मला भारतातील सर्वच प्रांतातील अभिजात संगीत खूप आवडते . त्यामुळे अशीच काही बंगाली गाणी मला पुन्हा पुन्हा ऐकून पाठ झालेली  आहेत . त्यातील एक गाणे आम्ही दोघांनी म्हटले .


बंगाली बाबू सोबत गाणी गाता गाता छोट्या अन्वीला चित्रे काढून देताना प्रस्तुत लेखक . पलीकडे बसलेल्या सौ वसुधा व श्री विवेक पंडित
चेतनने जेव्हा नर्मदे काठी राहून परिक्रमावासींना सेवा देण्याची इच्छा चितळे माईंकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की सेवा देण्याच्या आधी तू सेवा घे . म्हणजे तुला नक्की परिक्रमावासी काय प्रकारची सेवा इच्छितात ते लक्षात येईल . किती सुंदर पद्धत आहे ना ही शिकविण्याची ! त्याप्रमाणे चेतन खरोखरच आपली पत्नी आणि कन्या अन्वी हिला घेऊन नाभिस्थान नेमावर पर्यंतची एक पंच कोसी परिक्रमा अनवाणी पायाने करून आला . तो तर अनवाणी चाललाच चालला . परंतु त्याची पत्नी देखील अतिशय खडकाळ आणि खडतर अशा या भागातून अनवाणी पायाने चालली ! विशेष म्हणजे अन्वी छोटी आहे , हिला काही त्रास होणार नाही ना ? असा विचार आई वडील करत असताना ती मात्र या दोघांच्या पुढे सतत पळत राहिली ! तिच्या अंगामध्ये एका वेगळ्याच शक्तीचा संचार झाल्यासारखे झाले होते . अशी कठीण परीक्षा देऊन आल्यावर मगच चितळे मैयांनी चेतनाला सेवा करण्याची संधी दिली . ती देखील केवळ दहा दिवस . या कधी कोणाकडून थेट आर्थिक मदत वगैरे स्वीकारत नाहीत असे मला चेतनने सांगितले . त्यांचे म्हणणे असे असते की ज्यांना कुणाला परिक्रमावासींची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी लछोरा आश्रमाशी संपर्क करून दहा दिवस सेवा कार्यासाठी यावे . आता देखील पुण्याच्या चार महिला अशाच पद्धतीने १० दिवसीय सेवेसाठी आलेल्या होत्या . डॉक्टर जोशी म्हणून एक भक्त आहेत जे ही व्यवस्था पाहतात . अन्वी भरपूर चालली होती .त्यामुळे तुझे पाय दुखले का ग बाळ असे मी तिला विचारले . क्षणाचा ही विलंब न लावता ती म्हणाली , " एवढी काळजी वाटते तर माझे पाय दाबून दे ! " मग काय विचारता ! माझ्या झोळीमध्ये मी एक छोटीशी तेलाची बाटली कायमची ठेवून दिली होती . कुठे काही जखम वगैरे झाली तर त्यावर लावण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा आग नीट पेटावी यासाठी किंवा देवाच्या निरांजनीच्या दिव्यासाठी किंवा काहीच उपयोग नाही झाला तर किमान अश्वत्थामा भेटला  तर त्याला देण्यासाठी असे अनेक उपयोग डोक्यात ठेवून ती बाटली मी सोबत बाळगली होती . आज ती कामाला आली !बाटलीतल्या तेलाने तिचे दोन्ही पाय जोडून मस्तपैकी दाबून दिले . तिने देखील अतिशय आनंदाने ती सेवा स्वीकारली ! माझा असा भाव होता की मी साक्षात नर्मदा मैयाची चरण सेवा करत आहे !
मी हे करत असताना अन्वी चे वडील या प्रकाराचे फोटो घेत होते याची मला कल्पनाच नव्हती .आता त्यांनी मला हे फोटो पाठवले .
अन्वी मोठ्या कौतुकाने ही चरण सेवा पाहत होती
साक्षात नर्मदा मातेनेच आपली सेवा घेतली असा भाव ठेवून मी अन्वीच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला .
एवढे सर्व झाले परंतु अजून चितळे मैयांचे दर्शन झाले नव्हते .इतक्यात त्या स्वतः बाहेर आल्याच ! पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेला . गोरापान वर्ण आणि तेजस्वी चेहरा . अतिशय वेगळे परंतु सालस हास्य . स्पष्ट वक्तेपणा आणि त्याचवेळी प्रेमाने विचारपूस करताना व्यक्त होणारे उपजत मार्दव . अधिकार वाणीची भाषा परंतु नर्मदे प्रती तितकाच समर्पण भाव ! कधी ,कुठे ,कसे बोलावे याचे उत्कृष्ट भान . असे अद्भुत व्यक्तिमत्व लाभलेल्या याच त्या चितळे मैया ! यांनी कमरेला पट्टा लावलेला होता आणि बाहेर मांडलेल्या खुर्चीमध्ये त्या येऊन बसल्या . " तुमचे परिक्रमेचे अनुभव सांगा " असा विचारून गुळगुळीत झालेला प्रश्न मी त्यांना अजिबात विचारला नाही .फक्त ऐकत राहिलो .माझ्याशी त्यांनी भरपूरच गप्पा मारल्या आणि जेवण झाल्यावर इथेच मुक्काम करण्याची तंबी वजा आज्ञाच त्यांनी मला केली ! 
चितळे मैया यांचे सोबत प्रस्तुत लेखक
चितळे मैया आणि चेतन जोशी यांचे सोबत प्रस्तुत लेखक

त्यांची आज्ञा मोडणे मला शक्यच नव्हते . त्यामुळे मी आसन लावले . इतक्यात चितळे काका सुद्धा आले .काकांचा स्वभाव अतिशय विनोदी आहे वरवर पाहता ते गंभीर भासतात परंतु अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांच्याशी देखील भरपूर गप्पा झाल्या . त्यांनी जागोजागी लावलेली विविध झाडे आणि आश्रमाचा केलेला विकास फिरवून मला स्वतः दाखविला . या नर्मदा जयंतीला त्यांनी एक छोटेसे हनुमंताचे मंदिर आश्रमामध्ये बांधले होते . आश्रमाचा तो कोपरा अतिशय रमणीय होता कारण तिथून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन व्हायचे .
हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीचे मंदिराचे चित्र .मागे दिसणारे विस्तीर्ण मैया चे पात्र
आता हनुमान जी असे दिसतात
 लछोरा आश्रमातील वीर हनुमान जी .
संध्याकाळी माझ्या ओळखीचे सर्व परिक्रमा वासी ही तिथे मुक्कामासाठी आले . दरम्यान एक मोठा घोळ माझ्या हातून झाला होता . संध्याकाळी स्नानासाठी म्हणून मी नर्मदा मातेच्या काठावर जाऊन आलो .स्नान करण्यापूर्वी मी काठी व वस्त्रे एका दगडावर ठेवली आणि स्नानासाठी उतरलो . दरम्यान पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मी हळूहळू पुढे पुढे गेलो .  इतक्यात वाऱ्याने माझे वस्त्र उडून चालले म्हणून मी ते बाहेर येऊन पकडले . त्यानेच अंग पुसले आणि तेच गुंडाळून वरती निघून आलो . दंड तिथेच पडून राहिला . बरे तो दंड इतका आकर्षक होता की कोणीही घरी नेला असता . सुदैवाने त्यानंतर तिथे कोणीही फिरकले नसावे . किंवा मग मैयाने तो दंड कोणाला दिसू दिला नसावा .परिक्रमेमध्ये दंड कमंडलू व या सर्व गोष्टींचे अतोनात महत्त्व आहे . पुढे या दंडाने अनेक वेळा माझे प्राण वाचविले . माझे नशीब इतके थोर की संध्याकाळी एकनाथराव रोकडे काठावरून येताना माझा विसरलेला दंड त्यांना दिसला आणि तो ते वरती घेऊन आले ! मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की मी दंड कुठे ठेवला होता . परंतु माझा दंड दिसायला थोडासा वेगळा असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला होता . माझा दंड बघूनच त्यांना कल्पना आली की मी इथे मुक्कामी असणार आहे . त्यानंतर मात्र मी दंडाला कधीही अंतर दिले नाही . संध्याकाळी आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर आरत्या केल्या . रामदासी संप्रदायाची सांप्रदायिक उपासना (करुणाष्टके वगैरे ) हनुमंतासमोर करून मी सांप्रदायिक आरत्या आणि सवाया वगैरे म्हटल्या . पूर्वी राजाच्या दरबारामध्ये भाट लोक असायचे जे राजाचे कौतुक करायचे . ते जे काव्य मोठ्याने गद्य पद्धतीमध्ये म्हणतात त्याला सवाई असे म्हणतात . समर्थ रामदास स्वामींनी रामाचे , हनुमंताचे वर्णन करणाऱ्या अशा अनेक सवाया लिहिलेल्या आहेत . मोकळ्या हवेत खणखणीत आवाजात मैय्या समोर त्या सवाया म्हणताना मला खूप भारी वाटले . पुण्यातील माताराम लोकांना हा प्रकार आवडल्यामुळे सकाळी निघताना त्यांनी मला पुन्हा एकदा सवाया म्हणायला लावल्या आणि त्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्या .
डावीकडून क्रमशः प्रस्तुत लेखक चितळे मैया , चितळे काका ,एकनाथराव रोकडे, मी शिवलिंग दिले ते काका आणि शंकरराव सुखदेव शेळके . मागे नूतन हनुमान मंदिर . संध्याकाळची आरती व उपासना झाल्यावर काढलेले छायाचित्र .
पायी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आता वानप्रस्थाश्रमाचे जीवन नर्मदे काठीच व्यतित करायचे असे ठरवून चितळे दांपत्याने येथे जमीन विकत घेऊन हा आश्रम स्वतः उभा केलेला आहे . समोरचा जागा मालक यांना फारसा अनुकूल नव्हता असे माझ्या लक्षात आले . स्वतःबद्दल कधीच काहीही न बोलणारे हे दाम्पत्य आहे . आज नर्मदा परिक्रमे मध्ये मराठी लोकांची संख्या वाढलेली आहे त्याला कारणीभूत जसे जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक आहे तसेच भरीव योगदान चितळे मैया यांनी बनवलेल्या व्हिडिओजचे देखील आहे हे अनेक परिक्रमावासीच स्वतः मान्य करतात .मी त्याला एकट्याला गाठून चितळे दांपत्याचे कार्य किती मोठे आहे याची कल्पना देऊन भविष्यामध्ये कधी जमीन विकावीशी वाटली तर ती आश्रमाला दान करावी अथवा कमी किमतीमध्ये देऊन टाकावी असे सुचविले आणि त्याला ती युक्ती आवडली . त्याला चितळे काकूंच्या कार्याविषयी खरोखरच काही माहिती नव्हते . त्या दोघांकडे बघण्याचा गावकऱ्यांचा दृष्टिकोन या बैठकीनंतर नक्की बदलला असेल असा विश्वास मला वाटतो . इथून तसे बऱ्यापैकी लांब असलेल्या टीमरणी या गावात नोकरी करणारा एक मराठी युवक आपल्या पत्नीला मोटरसायकलवर मागे बसवून आश्रमामध्ये संध्याकाळी चितळे काकूंना भेटायला आला होता . त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या . संध्याकाळी पुण्यातील माताराम हनुमंतासमोर बसून काही साधना करीत होत्या . मी आश्रमात बसल्या बसल्या त्या प्रसंगाचे रेखाचित्र काढले . ते सर्वांना खूप आवडले व त्यांनी ते ठेवून घेतले .एकंदरीत आश्रमातील वेळ खूप चांगला गेला .आश्रमामध्ये सर्व प्रकारचे लोक येत .त्यातील गांजा मारणारे लोक गांजा मळून झाल्यावर त्याच्या बिया फेकून द्यायचे .त्यातून उगवलेली गांजाची झाडे मी काकांना दाखवली . त्यांना झेंडूची रोपे आणि गांजाची रोपे यातील फरक कसा ओळखायचा ते सांगितले . संध्याकाळी मी , काकांनी आणि चेतनने बागेची साफसफाई केली . तेव्हा गांजाची रोपे मी उपटणार होतो . परंतु काकांनी मला उपटू दिली नाहीत .त्यांनी मला सांगितले की या जगामध्ये काहीही चांगले किंवा वाईट नसते . या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत . जे मला अयोग्य वाटते ते कदाचित अन्य कोणासाठी अतिशय योग्य असू शकते . साधकाचा दृष्टिकोन अतिशय संयमित आणि संतुलित असायला हवा . झटकन निर्णय घेऊन पटकन कृती करणे हे फारसे हितावाह नाही . खरे सांगायचे तर सकाळी आश्रमामध्ये शिरतानाच मी गांजाची रोपे पाहून बाहेर पडणार होतो .परंतु पुण्याची गाडी आणि पुणेरी पाटी दिसल्यामुळे मी आत मध्ये आलो होतो ! जर मी माझ्या अनुमानानुसार हा कुठल्यातरी गांजा ओढणाऱ्या साधूचा आश्रम असावा असा वृथा भ्रम मनात घेऊन पुढे निघून गेलो असतो ,तर मोठ्या आनंदाला मुकलो नसतो काय ? त्यामुळे अनुभव कधीही श्रेष्ठ ! म्हणजे अनुमान करूच नव्हे का ? तर असे नाही ! परंतु अनुमान आणि अनुभव या दोन्हीपैकी अधिक वजन अनुभवाला द्यावे इतकेच ! 
नर्मदा खंड देखील पुणेरी पाट्यांपासून वंचित नाही !
रात्री भरपूर थंडी पडली . माझा जो मित्र चितळे मैया यांचा भक्त होता त्याला काकूंच्याच फोनवरून फोन लावून त्यांच्याशी बोलायला दिले . त्याचा नंबर मला आजही तोंडपाठ आहे . बराच वेळ त्यांचा व्हिडिओ कॉल चालला . योगायोगाने माझी आई आणि मावशी माझ्या मित्राच्या घरी आल्या होत्या .त्यामुळे परिक्रमेत प्रथमच त्या दोघींशी बोलणे झाले . दोघींना अश्रू अनावर झाले . परंतु मी अतिशय सुखरूप असून त्याची काही काळजी करू नये ,असे स्वतः चितळे मैयांनी सांगितल्यामुळे दोघीही निश्चिंत झाल्या . मी मित्राला फोन करावा नेमके त्याचवेळी या दोघीनी तिकडे काही कारण नसताना यावे हा किती अजब योगायोग आहे ! हे घडवून आणणारी ही जी शक्ती आहे , तिचेच नाव आहे नर्मदा ! मी आई आणि मावशी दोघींकडे समसमान राहिलो आहे . त्यामुळे त्या स्वतःला गमतीने देवकी आणि यशोदा म्हणतात ! दोन्हीही सख्ख्या बहिणी असल्यामुळे काळजी करण्याचा स्वभाव दोघींचाही सारखाच .अर्थात हा स्त्री सुलभ स्वभावाचा भागच आहे हे मान्य आहे . परंतु त्याचा त्रास इतर कोणाला नको म्हणून मी परिक्रमेदरम्यान कधीही या कोणाला कोणाच्या क्रमांकावरून फोन केला नाही . कारण मला ती फोनधारी व्यक्ती नर्मदातटावर भेटणार एका मिनिटासाठी आणि परत मी काठाने पुढे निघून जाणार . परंतु यांच्याकडे त्या व्यक्तीचा क्रमांक गेल्यावर या पुढील महिनाभर त्याला फोन करून डोक्याला ताप देणार ! कुठे आहे आमचा दिवट्या ?  त्यापेक्षा ती भानगड च नको ! म्हणून मी फोन नावाचे चेटूक परिक्रमेत आणलेच नव्हते . आणि तो निर्णय अतिशय योग्य ठरला ! आपणही लक्षात घ्यावे . परिक्रमा करताना फोनची गरज लागत नाही . यापूर्वी ज्या कोणी साधुसंतांनी परिक्रमा केल्या त्यांच्याकडे कुठे फोन होते ! आणि मुळात भ्रमणभाष म्हणजे ब्रह्माच्या नव्हे तर भ्रमाच्या दुनियेमध्ये तुम्हाला घेऊन जाणारे साधन आहे . जे समोर नाही ते समोर असल्याचा आभास उभा करतो तो हा फोन . परिक्रमे मध्ये कोठेही नकाशा बघावा लागत नाही किंवा कोणाचा फोन नंबर लिहून घ्यावासा वाटला तर वही पेन पुरेसे असते .त्यासाठी फोनची गरज लागत नाही . आपणच पहा मी स्वतः सोबत फोन बाळगला नसून देखील माझे परिक्रमेचे किती सारे फोटो लोकांकरवी मला मिळाले आहेत . तेच मी फोन सोबत घेतला असता तर नुसते फोटो काढत सुटलो असतो इतकी रम्य दृश्य नर्मदे काठी मी पाहिलेली आहेत . आता ती दृश्य मी हृदयाच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलेली असल्यामुळे कधीही पडल्या पडल्या आठवू शकतो . शिवाय त्याचा फोटो समोर नसल्यामुळे पुन्हा ती अनुभूती घेण्यासाठी तिकडे जाण्याची जी ओढ अंतर्यामी निर्माण होते ती फार महत्त्वाची आहे . पूर्वी फोन नसल्यामुळे नातेसंबंधांमध्ये अशी ओढ असायची . आता शेजारी शेजारी बसलेले पती-पत्नी देखील फोनच्या दुनियेमध्ये रममाण होऊन परस्परांना दुरावलेले दिसतात . मी स्वतः माझ्या आयुष्यात हे तत्व उतरवले आहे म्हणून अधिकार वाणीने सांगू शकतो की फोन शिवाय सुद्धा जगता येते . आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये देखील पाहिले की ज्यांना ज्यांना काही सांगावे असे मला वाटले त्यांच्या त्यांच्याशी संपर्क मैय्याने त्वरित करून दिलेला आहे . परिक्रमेवरून परत आल्यावर माझ्याकडे फोन नव्हताच . माझे एक मित्र तेव्हा दिल्लीला असायचे आणि त्यांना माझ्याशी संपर्क साधावासा वाटायचा . त्यांनी त्यांच्या भावाकरवी बळेच मला एक फोन पाठवून दिला . त्या फोनवर अन्य कुठलेही काम चालत नसून फक्त या ब्लॉग चे लिखाण इतकेच काम त्याला उरलेले आहे ! असा काही उपकारक वापर होत असेल तर तेवढाच क्षम्य आहे . बाकी फोनची साधकांना गरज नसते हे ठळक अक्षरांमध्ये हृदयात कोरून ठेवावे . ( सूज्ञ वाचकांना वेगळे सांगण्याची गरज नाही की यातून फोनचा व्यावसायिक वापर व अन्य अत्यावश्यक / आत्ययिक प्रसंगीचे वापर गृहीत धरून वर्ज्य केलेले आहेत )
मित्राला केलेल्या फोनचा अजून एक फायदा असा झाला की पुढे त्याने नर्मदे काठी मला भेटायला येण्याचे ठरविले आणि कुठून तरी कसा बसा माझा तपास लावून तो परिक्रमेदरम्यान येऊन भेटून गेला देखील !तो प्रसंग पुढे यथावकाश येईलच . असो . बास झाले हे फोन पुराण ! रम्य सकाळी उठून पुन्हा एकदा सुंदर पैकी नर्मदा स्नान करून सवाया म्हटल्या व त्या रेकॉर्ड झाल्या . सुंदर असा बालभोग चहा वगैरे घेतल्यावर सर्वांनी एकत्र प्रस्थान ठेवले . मी महाद्वाराच्या बाहेर पडल्यावर डावीकडे नर्मदेचा काठ पकडला आणि बाकीच्या वयोवृद्ध लोकांनी उजवीकडचा सडक मार्ग धरला . तत्पूर्वी चेतनाने आमचे फोटो काढले ते आपल्या करता देत आहे .
डावीकडून तिसरा प्रस्तुत लेखक
 (डावीकडून )पुण्यातील सेवाधारी माताराम मीरा गडकरी , रूपाताई ,अलका राजपुरोहित ,चितळे मैया , चितळे काका ,प्रस्तुत लेखक , शंकरराव शेळके ,एकनाथराव रोकडे आणि सहपरिक्रमावासी
नर्मदेची माणसं
खडकाळ काठाने चालून या बूटाचा सोल देखील आडवा तिडवा झिजलेला दिसतो आहे पहा . 
संत एकनाथांची आरती तोंडपाठ असलेले शंकर सुखदेव शेळके काका हे ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक इथून आले होते आणि अतिशय समजूतदार होते .यांचे माझे फार जुळायचे . यांनी मला अतोनात प्रेम दिले .
आयुष्यात कधीही दाढी मिशा न ठेवलेले एकनाथराव गोविंदराव रोकडे काका हे बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथून आले होते आणि यांच्यामुळे मुक्कामावरचे वातावरण सतत आनंदी ,उत्साही आणि विनोदी राहायचे!
या शेतकरी काकांचे नाव दुर्दैवाने मी विसरलो आहे परंतु यांचा खंबीर आधार सर्वांना असायचा आणि हे सर्वजण अखेरपर्यंत एकत्र चालले . मी दिलेले मैया काठी सापडलेले एक अतिशय सुंदर शिवलिंग यांनी प्राणा पलीकडे जपले असणार याची मला खात्री आहे . 
इथून पुढे यांची पुन्हा दर्शने झाली नाहीत .परिक्रमेत असे खूप लोक तुम्हाला भेटतात .ते तुमचेच आहेत असे आतून जाणवत असते . एका प्रेमसूत्राने नर्मदा सर्वांना बांधून ठेवते . जिथे ध्येय एक आहे तिथे मनभेद मतभेद फारसे होतच नाहीत हे कायम लक्षात ठेवावे . आणि संघटनेचे हेच सूत्र आहे की एका ध्येयाने प्रेरित होऊन मार्गक्रमणा करणारे लोक सदैव एकत्र राहतात आणि एकात्मता जपतात . नर्मदा परिक्रमा तुम्हाला खूप काही देते . छोट्या छोट्या गोष्टींमधून भेदाभेद अथवा मतभेद करण्याची आपल्या मानवी मनाची उपजत सवय परिक्रमेमुळे कायमची नष्ट होऊन जाते . फुलाच्या हारामध्ये जशी विविध रंगाची फुले एका सूत्रात गुंफलेली असतात तशी नर्मदा परिक्रमा या सर्व नररत्नांना प्रेमाच्या एका सूत्रात गुंफून टाकते ! कायमची ! 


लेखांक एकोणसाठ समाप्त ( क्रमशः )

लेखांक ६० : व्रतस्थ नाईकबुवा रामदासी आणि उधळलेल्या राणी घोडीला घातलेले रेवास्नान

चितळे मैया यांचा आश्रम सोडून जाता जाता त्यांनी सांगितले की पुढे शमशाबाद गावामध्ये एक रामदासी बुवा १३ कोटी रामनामाचा जप करत बसलेले आहेत .त्यांचे दर्शन अवश्य घेऊन जा . हे ध्यानामध्ये ठेवून काठाकाठाने मार्गक्रमणा सुरू ठेवली . मैया काठी एका छोट्याशा दहा बाय दहा आकाराच्या कुटीमध्ये पिंपरी चिंचवड येथील मूळ रहिवासी असलेले नाईक बुवा रामदासी म्हणून एक आहेत . ते १३ कोटी रामनाम जपाच्या अनुष्ठानासाठी बसलेले होते . यांचे मौन अनुष्ठान होते . म्हणजे दिवसभर ते रामनामाचा जप करीत त्या काळात बोलत नसत . सायंकाळी साडेसात नंतर त्यांचे मौन समाप्त होत असे . रामदासी बुवा गोरेपान आणि तेजस्वी होते . एकूण तपश्चर्येमुळे झळकणारे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते . मी आत मध्ये जाण्यापूर्वी दारात उभे राहून नर्मदे हर !जय जय रघुवीर समर्थ !  असा पुकारा केला .त्यांनी खुणेनीच मला आत येण्याचा इशारा केला . झोळी उतरवली आणि त्यांना दंडवत प्रणाम केला . त्यांनी शेजारी बसण्यासाठी आसन लावायची सूचना केली . समोर सातारा येथील गोंदवले गावातील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची तसबीर लावलेली होती . शेजारी श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचा फोटो होता . तसेच आनंद सागर महाराज यांची देखील प्रतिमा होती . या तीनही संतांनी नर्मदे काठी तपश्चर्या केलेली आहे . विशेषतः रामदासी संप्रदायातील एक प्रमुख संत म्हणून गणले गेलेले गोंदवलेकर महाराज हे त्यांच्या नाम प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत . अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर फिरून रामनामाचा प्रचार केलेला त्यांच्यासारखा दुसरा संत सापडणे कठीण आहे . कोणीही काहीही सल्ला मागितला तरी केवळ नाम घ्या असे एकच उत्तर महाराज देत असत .समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या बालपणी नाशिक जवळच्या टाकळी येथे कठोर तपश्चर्या करून तेरा कोटी रामनामाचा जप पूर्ण केला होता व तो जप सिद्ध झाल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले ,अशी समकालीन कागदपत्रांमध्ये नोंद आहे . त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी तुला हवा तो वर माग असे सांगितल्यावर रामदास स्वामी म्हणाले होते "जप होता तेरा कोटी । साक्षात भेटेल जगजेठी "  असा आशीर्वाद किंवा असे अभिवचन आम्हाला द्या . अर्थात जो कोणी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण करेल त्याला रामरायाने दर्शन द्यावे असे ते मागणे होते आणि त्यानंतर त्याप्रमाणे खरोखरच अनेक साधकांनी १३ कोटी रामनाम जप पूर्ण करून प्रभू रामाचे दर्शन मिळविलेले आहे . नाईक बुवा मौनामध्ये असल्यामुळे आता निघावे असा विचार करून मी उठू लागलो . त्यांनी मला खुणेनेच बसण्याचा इशारा केला . 
बाहेर काही माणसे गप्पा मारत बसली होती . बुवांनी घंटा वाजवल्याबरोबर त्यातील एक माणूस पळत आला . त्याला रामदासी बुवांनी चहा करण्याची सूचना खुणेने केली . त्याने लगेच बाहेर तीन दगड मांडून चूल पेटवून आतून पातेले नेऊन मस्तपैकी तीन चार कप काळा चहा बनवला . सकाळची थंडी पडलेली होती त्यामुळे तो चहा खूपच आवश्यक होता ! चहा पिऊन झाला आता निघावे म्हणून मी उठू लागलो तर बुवांनी मला पुन्हा एकदा बसण्याची सूचना केली . मी इथे कित्येक तास बसू शकलो असतो परंतु महाराज मौन असल्यामुळे बसून करायचे काय असा मुख्य प्रश्न माझ्यापुढे होता .  मी महाराजांना विचारले की आपली हरकत नसेल तर श्रीक्षेत्र गोंदवले इथे उपासनेमध्ये गायली जाणारी काही भजने गाऊ का ? नुसते गोंदवले असे नाव काढल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले . त्यानंतर मग मी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीसमोर म्हटली जाणारी सर्व भजने म्हटली . या ब्रह्मचैतन्या सारिखा नाही पाहिला , दीन हाका मारी , स्वामी माझा पाहिला या माणगंगा तीरी , धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार अशी सर्व प्रसिद्ध पदे म्हणून झाल्यावर महाराजांची आरती देखील म्हटली . नाईक बुवा रामदासी मौनामध्ये होते . परंतु डोळ्यांचे मौन नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना अखंड वाहत राहिल्या .
साधारण दीड तास झाल्यावर त्यांनी घड्याळाकडे पाहिले आणि आता तू निघू शकतोस अशी सूचना मला खुणेने केली . जाण्यापूर्वी त्यांनी स्वस्ताक्षरात त्यांचा संपर्क क्रमांक माझ्या वहीमध्ये लिहून दिला . आता हरदा जिल्हा सुरू झालेला होता . मी अतिशय वेगाने पुढे निघालो . मौनामध्ये असलेल्या माणसाशी आपण काय बोलणार परंतु असे असून देखील इथे दीड तास मोडलाच आहे त्यामुळे पुढे वेगात चालून ते अंतर तोडावे असा साधा विचार डोक्यात चालू होता . काठाकाठाने निघालो होतो . वाळूचा किनारा , मग मातीचा , मग चिखलाचा असे क्रम सुरू होते . आता मी गोयत नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये पोहोचलो होतो . इतक्यात माझे लक्ष दूरवर साधारण २०० मीटर अंतरावर चाललेल्या एका घटनेने वेधले . उजव्या हाताला शांतपणे वाहणारी नर्मदा माई होती तर डाव्या हाताला गोयत गावाकडे जाणारा मातीचा मोठा चढ होता . या चढावरून एक इसम घोड्यावर बसून त्या घोड्याला खाली आणण्याचा प्रयत्न करत होता . आणि घोडा प्रचंड उड्या मारत त्या इसमाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता . घोड्याची एकंदर देहबोली पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले की हा घोडा काहीही करू शकतो . त्यामुळे मी धावतच त्या दिशेला निघालो . आवाजाच्या टप्प्यात आल्यावर मी त्या माणसाला आवाज देऊ लागलो . त्याने माझ्याकडे पाहिल्याबरोबर घोडा देखील माझ्या दिशेला वेगाने धावू लागला . घोडा अतिशय संवेदनशील प्राणी असतो . वरती बसलेला घोडेस्वार ज्या दिशेला मान वळवेल त्या दिशेला घोडा देखील वळतो इतका त्याच्या पाठीचा कणा संवेदनशील असतो . या घोड्याला नर्मदे कडे जायचे नव्हते हे मला स्पष्ट दिसत होते . आणि मालकाला घोड्याला वरती जाऊ द्यायचे नव्हते हे देखील त्याला कळले होते . त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून घोडा माझ्या दिशेने आला . मी दंड लपवला आणि पटकन पुढे जाऊन त्याचा लगाम धरला . मी लगाम धरल्या धरल्या वरच्या माणसाने उडी मारली आणि मला म्हणाला आता तुम्हीच हिला सांभाळा ! मी थकलो ! घोडीवर बसलेला उघडा बंब मनुष्य घामाघूम झाला होता !  घोडी अजूनही उधळलेलीच होती . मी तिला हळू हळू शांत केले . आमच्या घोड्याच्या भाषेत त्याला तसल्ली देणे असे म्हणतात . या माणसाचे नाव होते भगतराम बाणा . जाट समाजाचा हा मनुष्य होता . ( हे त्यांनीच मला सांगितले ) . याचे गावामध्ये किराणा मालाचे छोटेसे दुकान होते . या गावांमध्ये बिश्नोई लोकांची मोठी वस्ती आहे . मूळ राजस्थानातील असलेले बिश्नोई लोक घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहेत .त्यामुळे बऱ्याच जणांकडे घोडे असतात . हा मात्र जाट समाजातील पहिला असा मनुष्य होता की ज्याने घोडा विकत घेतला होता . आणि दोन-तीन दिवसच झालेले असल्यामुळे या घोड्याला अजून नर्मदेमध्ये स्नान त्याने घातलेले नव्हते . याला घोडेस्वारीचा फारसा अनुभव नव्हताच . ते त्याची अवस्था पाहूनच मी ओळखले होते . माझ्या हातात घोडा इतका शांतपणे कसा उभा आहे हेच त्याला कळत नव्हते . मी घोडी सोबतच घोडेस्वाराला सुद्धा शांत केले . त्याला कमंडलू मधले पाणी प्यायला दिले . आणि त्याला सांगितले काही काळजी करू नकोस तुझ्या या घोडीला आज मी स्वतः नर्मदा स्नान घालीन . आणि घोड्याला स्नान कसे घालायचे हे देखील तुला शिकवेन . त्याला फार आनंद झाला !मी काही न सांगताच त्याच्या लक्षात आले होते की मला घोड्यांमध्ये थोडेफार ज्ञान असावे . कारण त्याशिवाय संपूर्ण घोडा कोणी अनोळखी माणसाच्या ताब्यात देत नाही ! खरे म्हणजे भगतराम त्या घोडीला अक्षरशः घाबरला होता . राणी नावाची ही सुंदर काळी घोडी वयाने देखील तरुणच होती . प्रचंड शक्ती निशी जेव्हा ती अलप करायची म्हणजे पुढचे दोन्ही पाय हवेत घ्यायची तेव्हा पाठीवर बसण्यासाठी रिकीब वगैरे न टाकलेला भगत राम मोठ्या आवाजात आरडाओरडा करायचा आणि मैयाचा धावा करायचा ! ती घोडी ज्या पद्धतीने खाली उतरण्यास विरोध करत होती ते पाहता तिने कधीही भगत रामला फेकून पोबारा केला असता . घोड्यांची एक स्वतःची नाजूक मानसिकता असते . त्यांचे वर्तन पतिव्रता स्त्रीप्रमाणे असते . एकदा एखाद्या व्यक्तीला मालक म्हणून त्यांनी स्थान दिले की त्याच्याशी ते कायम एकनिष्ठ राहतात . इथे घोडी नवीन असल्यामुळे तिने अजून भगतराम चा मालक म्हणून स्वीकारच केलेला नव्हता . त्यात नवीन वातावरण , नवीन गाव आणि नर्मदा नदीचे एवढे मोठे भव्य पात्र तिने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते ! त्यामुळे ती बिथरली होती .अशावेळी धाक धपटशा करून घोड्याला नवीन वातावरणात ढकलण्यापेक्षा प्रेमाने अंजारून गोंजारून नेलेले कधीही चांगले असते . परंतु घोडा सांभाळण्याचा अनुभव नसल्यामुळे भगत रामला यातील फारसे काही माहिती नव्हते .म्हणजे हिच्या पूर्वी त्याने चेतन नावाचा एक घोडा सांभाळला होता .परंतु तो याने स्वतः कधी हाताळलाच नाही .आणल्यापासून आजारी राहिलेला तो घोडा लवकरच मरून गेला . मी माझे सामान शांतपणे एका बाजूला उतरवून ठेवले . आणि घोड्याला कसे हाताळावे याचे प्रशिक्षण भगत रामला द्यायला सुरुवात केली . घोड्याचे मानसशास्त्र ,घोडेस्वाराचे मानसशास्त्र असे सर्व अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला समजावून सांगितले . नुसते समजावून न सांगता समोर प्रत्यक्ष उदाहरणे त्याला दाखविली . राणी घोडीने क्षणातच माझा मालक म्हणून स्वीकार केलेला होता . त्यामुळे मी जिकडे जाईन तिकडे लगाम न धरता ती माझ्या मागे येऊ लागली . हे पाहून भगत रामला मोठे आश्चर्य वाटले . मी त्याला सांगितले की आता गंमत पहा .हीच राणी घोडी जी तुला नर्मदेमध्ये जाण्यापासून रोखत होती ती आता स्वतः नर्मदेमध्ये जाते की नाही पहा ! आणि मी हळूहळू नर्मदेमध्ये शिरू लागलो . आश्चर्य म्हणजे राणी देखील माझ्यामागे नर्मदेमध्ये आली . हळूहळू हुंगत हुंगत वास घेत पाण्याची चव चाखत तिने नर्मदेला स्पर्श केला आणि भगतराम बाणाला खूप आनंद झाला !
प्रस्तुत लेखक आणि राणी घोडी गोयत घाटावर नर्मदा स्नान करताना
आम्ही घोड्याला स्नान घालत असताना गावातील एक युवक तिथे आला आणि त्याने त्याचा व्हिडिओ घेतला . मी मित्राचा क्रमांक सांगितल्यावर त्याने तो व्हिडिओ पाठवून दिला . तो आपल्या वाचकांसाठी सोबत जोडत आहे . 


वरील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की नर्मदा स्नान करताना बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी राणी घोडी केवळ हाताचा इशारा केल्यावर जागेवर कशी स्तब्ध उभी राहते .

( टीप : नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही परिक्रमा वासींनी घोड्याला हात लावण्याचा प्रयत्न शक्यतो करू नये . घोड्याने घेतलेला चावा किंवा घातलेली लाथ प्राणघातक ठरू शकते . किमान अस्थिभंग झाल्यामुळे परिक्रमा खंडित होऊ शकते .प्रस्तुत लेखकाला घोडेस्वारीची अत्यंत आवड असून घोड्यांना शिकविणे हे त्याचे अधिक आवडीचे काम आहे . गेली अठरा वर्षे घोडेस्वारीचा व्यापक अनुभव गाठीशी आहे .तसेच घोड्यांचे भारतभरातील विविध बाजारात आवड म्हणून त्याचे जाणे येणे असते . स्वतः देखील हौस म्हणून घोडे पाळून झालेले आहेत .तरी कृपया कुठल्याही जनावरापासून परिक्रमेत चार हात लांबच राहिलेले उत्तम ही सर्वांना नम्र प्रार्थना )
घोड्याचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . घोडा हा प्रस्तुत लेखकाचा जीव की प्राण असल्यामुळे त्याच्यापासून अधिक काळ लांब राहता येणे शक्य नव्हते . परंतु हे मैयाला कसे कळाले हा खरा संशोधनाच विषय आहे ! एका ठराविक अंतराने परिक्रमेमध्ये मला घोडे भेटत राहिले ! माझ्यासोबत मुक्कामी भेटणाऱ्या परिक्रमा वासींना मी जेंव्हा हे सांगायचो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे ! कारण त्या कोणालाही , कधीही , कुठेही घोडा नावाचा प्राणी दिसलाच नाही ! आहे की नाही गंमत ! या विषयाची मला किती प्रीति व गती आहे हे वाचकांना कळावे म्हणून काही छायाचित्रे सोबत जोडत आहे .
राष्ट्रपती भवनातील अश्वासह प्रस्तुत लेखक .
 राष्ट्रपतींचे अंगरक्षक हे भारतातील सर्वोत्तम सैनिक व घोडेस्वार असतात . 
हे घोडे देखील भारतातील सर्वोत्तम घोडे असतात .
 घोड्याला ही कृती फार आवडते . हे तुम्ही करू शकत असाल तर घोडा तुम्हाला शरण गेल्याचे ते प्रमुख लक्षण असते .
आपल्या लाडक्या अश्वासह प्रस्तुत लेखक

महाविद्यालयीन जीवनापासून अश्वप्रेम जोपासणारा प्रस्तुत लेखक


अश्वकुळातील सर्वच प्राणी सुंदर असतात .
 हिमालयातील खच्चर ( खेचर ) या प्राण्यासोबत प्रस्तुत लेखक .

सांगायचे तात्पर्य इतकेच की घोडे हाताळण्याचा अनुभव असल्याशिवाय त्याच्याजवळ जाणे घातक व धोकादायक ठरते .
प्रस्तुत लेखकाला घोड्यांनी अनेक वेळा फेकलेले , पाडलेले ,आपटलेले , तोडलेले आहे ! अशाच एका अश्वामुळे झालेला अस्थिभंग त्याला दाखवताना प्रस्तुत लेखक . हा अस्थिभंग बरा होण्यापूर्वीच परिक्रमा उचलल्यामुळे त्याच्या वेदनेचा फार त्रास सुरुवातीला व्हायचा . कारण दंड कमंडलू धरावे लागायचे .परंतु पुढे पुढे मैया च्या कृपेने ती वेदना कायमची शमली .
घोड्याच्या वर बसलेले असताना हाताळण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याच्यासोबत असताना हाताळण्याची पद्धत वेगळी असते .
घोडा हा अतिशय संवेदनशील ,चाणाक्ष , चपळ व शक्तिमान प्राणी आहे
प्रस्तुत लेखकाचे दक्षिण भारतातील घर आणि राणी घोडी .  राणी घोडीचे प्रशिक्षण सुरू होते. घोडेस्वाराने पायाचा चवडा डावीकडे वळवला की राणीने तिचा पुढचा पाय तत्काळ डावीकडे वळवणे अपेक्षित होते . ते जमल्यावर काढलेले छायाचित्र !
प्रस्तुत लेखकाने तमिळनाडू येथे सांभाळलेली व शिकविलेली राणी घोडी . 
नुसता हाताने थांब असा इशारा केल्यावर घोडी जागेवर कशी थांबली पाहिजे हे मी भगतराम बाणाला शिकविले .
घोड्याचा खरारा कसा करावा आणि आंघोळ कशी घालावी हे देखील त्याला शिकविले .
मी राणी घोडीवर बसावे असा आग्रह भगत राम ने केला परंतु घोडा हे देखील एक वाहन असल्यामुळे त्याच्यावर बसलो नाही . परिक्रमेच्या नियमात वाहनाचा आधार घेणे मान्य नाही . 
भगतराम बाणाकडून स्वतः  संपूर्ण अंघोळ घालण्याची प्रक्रिया करवून घेतली . मगच आम्ही बाहेर आलो . 
घोड्याची शक्ती अफाट असते आणि तो आपल्याला काहीही करू शकतो हे डोक्यात ठेवूनच त्याच्याशी वागावे लागते . आणि काहीही झाले तरी आपण त्याला घाबरत नाही हे त्याला समजून सांगावे लागते .
नर्मदा मातेला माझे अश्वप्रेम कळले हे मात्र खरे ! पुढे देखील वेळोवेळी लेखांतून मला रेवातटाकी भेटलेले असे अनेक घोडे येऊन तुम्हाला भेटणार आहेत ! तूर्तास हे अश्वपुराण इथेच समाप्त करूयात ! अश्वशक्तिः यशोबलम् ।
राणी घोडीला मनासारखी आंघोळ घालून झाल्यावर मी बाहेर आलो आणि अंग पुसून वस्त्रे धारण करून पुढे निघणार इतक्यात भगतरामने विनंती केली की कृपया त्याच्या घरी चहा घेण्याकरता यावे . परिक्रमे मध्ये कोणाला अन्नपदार्थासाठी नाही म्हणाले की काय होते हे आता पक्के ठाऊक झालेले असल्यामुळे गुपचूप त्याच्या मागे निघालो .भगत रामला सांगितले की घोडीला पकडू नकोस तिचे तिला येऊ दे . बाहेर आल्या आल्या तिने वाळूमध्ये मस्त लोळण घेतली . असा मोकळेपणा तिला खूप वर्षांनी मिळाला असावा . ही वाळू लगेच निघते त्यामुळे पुन्हा आंघोळ घालायची गरज नाही असे त्याला सांगून मग आम्ही सारे  निघालो . भगतराम पुढे त्याच्या मागे मी आणि आमच्या मागे काहीही न करता आपण होऊन चालत येणारी राणी घोडी . आमची ही मिरवणूक गावकरी बघत होते . भगतराम चे घर आणि दुकान नदीपात्रापासून तसे जवळ होते आणि समोर त्याने तबेला केलेला होता .जय बाबा रामदेव किराणा गोयत गाव असेच्या दुकानाचे नाव होते. तबेल्यामध्येच बसलो आणि त्याने चहा मागविला . त्याला तबेला कसा ठेवावा व अन्य काही सूचना सांगितल्या . चेतन घोडा कशामुळे गेला असेल याची कल्पना त्याला दिली . आता भगतराम त्याचा अनुभव मला सांगू लागला . तुम्हाला मराठी भाषेमध्ये अनुवाद करून सांगतो . भगतराम बाणा हा जाट समाजाचा असल्यामुळे गावामध्ये अल्पसंख्य होता . गावामध्ये बिश्नोई समाज अधिक होता . आजही इतके तुकडे आपल्या देशाचे झालेले पाहून सुद्धा आपण हिंदू म्हणून एकत्र राहत नाही हे किती दुर्दैव आहे पहा . परंतु बिश्नोई समाजाचेच लोक घोडे पाळतात आणि तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे अशी त्यांची धारणा असते ,असे मला भगतराम म्हणाला . याला कधीतरी कोणीतरी घोड्यावरून बोलले असल्यामुळे याने असे ठरविले होते की आता आपण स्वतःचा घोडा घ्यायचा . परंतु घोडेस्वारीचे ज्ञान नसल्यामुळे याचा एक घोडा गेला आणि हा दुसरा होता . आता या घोडीला नर्मदा स्नान घालून तिला पवित्र करावे असा स्वाभाविक विचार याने केला व घोडीला घराबाहेर काढले . परंतु जसा हा घोडीवर स्वार झाला तसे तिने नखरे करायला आणि फेकाफेकी करायला सुरुवात केली . याच्या नशिबाने हा कसाबसा तग धरून वरती बसून राहिला होता परंतु याला घोडेस्वारी फारशी येत नसल्यामुळे याला कधी आपण घोडी वरून उतरतो असे झाले . तशातच घोडीने मोकळा रस्ता दिसला म्हणून मैयाच्या दिशेने याला पळवत नेले . परंतु समोर भव्य पात्र बघून ती बिथरली व घाबरून पुन्हा उलटे वळू लागली . भगतरामने विचार केला की आता इथवर आलेली आहे तर हिला मैयापर्यंत नेऊयातच . हे सर्व चालू असताना गावातील लोक याची मजा बघत होते . भगतराम बाणाने मनोमन नर्मदा मातेची प्रार्थना केलीकी मैया काय वाटेल ते कर परंतु मला या घोडीवरून खाली पडू नकोस .कारण मी जर घोड्यावरून खाली पडलो तर तो माझा अपमान सारे गावकरी बघतील आणि त्यांचा सिद्धांत सिद्ध होईल की अन्य समाजाच्या लोकांनी घोडा सांभाळायच्या भानगडीत पडू नये ! मैया मला वाचव !एखादा घोड्याचा जाणकार पाठव ! मला सोडव ! सुरक्षित खाली उतरव असा विचार खरोखर त्याच्या मनात येऊन गेला ! आणि इतक्यात मी हा प्रकार पाहिला आणि धावतच मदतीला . आता मला कळाले की नाईक बुवा रामदासी यांनी मला दीड तास का रिकामेच बसवून ठेवले ! कदाचित तेथून मी लवकर निघालो असतो तर हा प्रसंग मला पाहायला मिळाला नसता .मी तसाच पुढे निघून गेलो असतो . आणि इकडे मागे गावापुढे बिचार्‍या भगतरामची नाचक्की झाली असती .  हा प्रसंग पाहिल्यावर तुम्हाला नर्मदा माता कशाप्रकारे कार्यरत आहे याची थोडीशी कल्पना येईल . पुढे कुठे , कोणाचे , काय होणार आहे हे तिला आधीच माहिती असल्यामुळे ती तुमच्या हृदयांतर्यामी योग्य ती स्फूर्ती ,योग्य ती प्रेरणा ,योग्य ती इच्छा ,योग्यवेळी ,योग्य प्रकारे निर्माण करते आणि योग्य प्रकारे पूर्ण देखील करते ! अशी महायोगिनी आहे आपली नर्मदा मैया ! भगतराम माझ्या मागे लागला की तुम्ही आता राणी घोडीला घेऊन जा आणि उरलेली परिक्रमा हिच्यावर बसूनच पूर्ण करा . त्याने दोन गोष्टी साध्य झाल्या असत्या एक म्हणजे माझी परिक्रमा वेगाने पूर्ण झाली असती आणि दुसरी गोष्ट राणी घोडीचे उत्तम पैकी प्रशिक्षण झाले असते जे त्याला हवे होते . परंतु वाहनाने परिक्रमा करण्याचा माझा कुठलाही विचार सध्या नाही हे त्याला नम्रपणे व ठामपणे सांगून मी त्या अस्वस्थ अश्वस्थाला आश्वासन देऊन आश्वस्त केले की पुन्हा कधी त्याला घोड्यावर परिक्रमा करायची इच्छा झाली तर मी त्याच्यासोबत अश्वारूढ होऊन उपस्थित असेन ! इति श्री रेवाखण्डे गोयत ग्रामे भगतरामस्य राज्ञी अश्वपुराणम् सम्पूर्णम् । श्री नर्मदार्पणमस्तु ।


लेखांक साठ समाप्त (क्रमशः ) 

लेखांक ६१ : खरा रेवाभक्त कृषक रामदयाळ कीर आणि नर्मदेच्या नाभी स्थानचा पागल बाबा आश्रम

नर्मदेच्या नाभीस्थानाच्या जवळ मी आता पोहोचत होतो . नेमावर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नर्मदेचे नाभी स्थान म्हणून ओळखले जाते . ते उत्तर तटावर आहे . मधोमध नर्मदेची नाभी आहे . नाभी म्हणजे नाभीकुंड आहे . आणि दक्षिण तटावर हंडीया गाव आहे . भाविक भक्त नर्मदा नाभीचे दर्शन घेण्यासाठी नावेने जातात परंतु परिक्रमावासींना नर्मदेच्या मध्यापर्यंत प्रवेश करायला परवानगी नाही . तर हा परमपावन परिसर जवळ येत असल्यामुळे हळूहळू आश्रमांची संख्या वाढत जाते . आता देखील काठाने चालताना मी एका मागोमाग एक गावे मागे टाकत होतो तसेच अनेक आश्रम देखील मागे टाकले .गोयद गाव सोडल्यावर अजनई ,सुरजना ,बगलातर , मनोहरपुरा , भमोरी अशी गावे पार केल्यावर हंडीया येते . या संपूर्ण भागामध्ये नर्मदेचा किनारा अतिशय मजेशीर आहे .म्हणजे सलग एकसंघ रेषेमध्ये नर्मदा वाहत नसून अतिशय कातरलेला कुरतडलेला किनारा आहे .कधी कधी नर्मदा जलाची पातळी वाढून ती विस्तृत पात्र धरून वाहते .परंतु पाणी उतरल्याबरोबर मोठे मोठे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचून राहते व आजूबाजूला वाळूचे रस्ते तयार होतात . त्यामुळे नक्की मूळ पात्र कुठले हे बरेचदा लक्षात येत नाही . इतके छोटे छोटे तलाव तयार झालेले असतात . विशेषतः मी अगदी किनारा धरून चालत असल्यामुळे मी बरेचदा फसलो . बरेच चालल्यावर लक्षात येतसे की डावीकडे एक मोठा तलाव साचून राहिलेला आहे आणि तो पोहत पार करता येणे शक्य नाही कारण त्यात गाळ असायचा . मग पुन्हा त्या तलावाच्या काठाने उलटे चालायचे आणि किनारा पकडायचा . परंतु त्यामुळे मानवी वावर नसलेल्या अनेक जागा पाहायला मिळाल्या . जिथे वाळूचा उपसा चालत नाही तिथे तिथे प्रचंड पक्षी जीवन पाहायला मिळाले . कारण या टापूतील वाळू माफियांमुळे बराचसा भाग पक्षांसाठी निरुपयोगी ठरलेला आहे . दिसायचे तिथे एकदम शंभर शंभर पाणकावळे दिसायचे . तिथेच मोठाले बगळे पण असायचे . बाकी वाळू उपसा असेल तिथे शुकशुकाट असायचा . भुरा बगळा सारख्या काही पक्षांनी मात्र मोठ्या हिमतीने मानवासह राहण्याचे सहचर्य उत्तम पैकी आत्मसात केलेले आहे . 
या भागात मोठ्या संख्येने दिसणारे पाण पक्षी .पक्षी निरीक्षकांनी या मुद्द्यांची नोंद घ्यावी .
मध्ये तयार झालेल्या बेटावर बगळ्यांची शाळा .
या भागातील नर्मदा पात्राचे किती विविध प्रकार आढळतात हे आपल्याला कळावे म्हणून खालील छायाचित्र पाहावीत . ही सर्व याच भागातील गुगल नकाशावरून साभार घेतलेली आहेत .
नर्मदेचे सुंदर , विस्तीर्ण , शांत व खोल पात्र
नर्मदेचे विस्तीर्ण , खोल व गतिमान पात्र
नर्मदेचे अरुंद ,गतिमान व उथळ पात्र
नर्मदेचे विस्तीर्ण , शांत व उथळपात्र
वाळू उपसणाऱ्या नावांची लांबी आणि आकार आता हळूहळू मोठा होत चालला होता .
वाळू उपसणाऱ्या ट्रॅक्टरची अश्वशक्ती देखील वाढत चालली होती .
मध्येच अचानक एखादा खडकाळ टापू उड्या मारत मैया पार करायची
पाण्याची नुसती वरची पातळी पाहून खोलीचा अंदाज करता येणार नाही इतकी नर्मदा अकल्प्य आहे .
तशा गडबडीमध्ये देखील लोकांनी शेती करणे काही सोडले नव्हते . उलट वाळू उपसा करणाऱ्या लोकांच्या जाण्या येण्यामुळे शेताचे नुकसान होऊ नये म्हणून चांगली मजबूत कुंपणे सर्वत्र घातलेली दिसत होती .
 कुंपण ओलांडून जाण्यापेक्षा मनुष्य स्वाभाविकच बाहेरून पुढे मार्गस्थ होतो . परंतु त्यामुळे मैय्याचा सहवास तुटतो याची कल्पना शेतकऱ्यांना बरेचदा नसते ! इथून पुढे तर एका अतिशय विचित्र समस्येला तोंड द्यावे लागले . ती समस्या होती मानवी विष्ठेवर घोंगावणाऱ्या घर माशांची जिल्हा इंग्रजी मध्ये कॉमन हाऊस फ्लाय असे म्हणतात . ग्रामीण भाषेत तिला अतिशय अश्लाघ्य परंतु योग्य शब्द आहे . गूमाशी . 
या माशा चालताना प्रचंड त्रास देतात . सतत तुमच्या डोक्याभोवती कानाभोवती नाका भोवती उडत राहतात . त्यांचा आवाज इतका त्रासदायक असतो की आपले लक्ष विचलित होते . शिवाय त्या संधी मिळताच कुठेतरी बसायचा प्रयत्न करतात . यांना सतत हाताने हाकलून हात दुखायचा . एका हातात दंड असायचा . अखेर मी तो दंड गोल फिरवायला सुरुवात करायचो . त्याने थोडाफार फरक पडायचा परंतु या पुन्हा हजर ! त्यांना घालवण्याचा एकही खात्रीशीर उपाय मला सापडला नाही . मी हातामध्ये उपरणे घेऊन त्यांनी माशा वारायचो . बरं यांची संख्या इतकी प्रचंड होती ती सलग चार-पाच किलोमीटर वेगळ्या वेगळ्या माशा तुमच्या मागे लागायच्या . पूर्वी एका प्रकरणांमध्ये मी मानवी विष्ठे  संबंधित विस्तृत विवेचन केलेले आहे . त्यातील नियम न पाळल्याचा हा परिणाम होता . या माशा नेमक्या ठराविक भूभागातच आढळायच्या . कुठल्याही गावाजवळ कधी इतक्या माशा सापडल्या नाहीत जितक्या माशा तात्पुरत्या वस्तीजवळ सापडायच्या .उदाहरणासह सांगतो . खालील नकाशा पहा . सुरजना गावानंतर बाकुल नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते .
चित्रात उजवीकडे वाहणारी नर्मदा माता आहे . डावीकडे उंच टेकाडावरील शेती आहे . मध्ये वाळूचा किनारा दिसतो आहे . समोर बाकुल नदी नर्मदेला येऊन मिळालेली दिसते आहे . उजवीकडे वाळूचे ढिगारे उपसण्याचे काम चालू आहे आणि ती घेऊन येणाऱ्या नावांची गर्दी दिसत आहे . त्यानंतर वाळू वाहून नेणारे डंपर , हायवा ,ट्रॅक्टर आदींची रांग दिसते आहे . आणि त्यानंतर इथे काम करणाऱ्या कामगारांची तात्पुरती घरे ,झोपड्या , राहुट्या दिसत आहेत .
प्रश्न वाळू उपसणे हा नव्हता . परंतु या वाळू उपसणाऱ्या हजारो कामगारांनी योग्य पद्धत न अवलंबता केलेल्या शौच विसर्जनामुळे हा संपूर्ण पट्टा हागणदारीयुक्त झाला होता . कामगार, त्यांच्या बायका, आई-वडील ,मुले असे सर्वच जण इथे ओळीने माळा लावत होते . त्यावर घोंघावणाऱ्या करोडो माशा अक्षरशः बेजार करून सोडत होत्या . शेवटी मी अक्षरशः संपूर्ण चेहरा उपरण्याने झाकून चालायला सुरुवात केली .  या लोकांचे प्रबोधन केले तर हा प्रश्न सुटणार आहे . एकंदरीतच या विषयाचे व्यापक राष्ट्रीय प्रबोधन होणे आवश्यक आहे . ज्यांना या क्षेत्रामध्ये काही सामाजिक कार्य उभे करायचे आहे त्यांना प्रचंड संधी आहे . हेच मलमूत्र खड्डा करून त्यात विसर्जित करून माती लोटून दिली तर अतिशय सुपीक खताचे काम करणार आहे . शिवाय त्यातून रोगराईचा होणारा फैलाव सुद्धा थांबणार आहे . एकंदरीत इथून मोठ्या कष्टाने कसाबसा मार्ग शोधून पुढे जात असतानाच शेतकऱ्यांनी आडवी घातलेली कुंपणे प्रचंड त्रास देत होती . मनापासून अशा शेतकऱ्यांबद्दल वाईट वाटू लागले . हे खरे आहे की परिक्रमावासी आजकाल काठाने जात नाहीत .  परंतु हे देखील तितकेच खरे आहे की अशा पद्धतीने घातलेल्या अशास्त्रीय , अतार्किक आणि त्रासदायक कुंपणांमुळे परिक्रमावासी तिकडून जाणे टाळतात . असो .
एखाद्या रणरणत्या वाळवंटातून जाताना अचानक समोर एखादा थंडगार पाण्याचा झरा यावा तसे काहीसे वाटावे अशी एक पाटी समोर दिसली . त्यावर लिहिले होते , "नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा वासी कृपा करके मेरे क्षेत्र में अपने चरणों की धुली झाडे ।आपके चरण स्पर्श से मेरा खेत पावन हो जायेगा । " नुसती पाटी लावली नव्हती तर शेतातून जाण्यासाठी बाण वगैरे काढून सुंदर पायवाट बनवली होती जिच्या दोन्ही बाजूंनी सुंदर फुलझाडे लावली होती . हा अतिशय स्वर्गीय अनुभव होता ! त्या शेतातच उभे राहून नर्मदा मातेला प्रार्थना केली की या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू दे आणि त्याच्या पुढील सर्व पिढ्यांचे कल्याण होऊ दे ! शेतातून बाहेर पडल्या पडल्या वाळू वाल्यांच्या झोपड्या सुरू होत होत्या . त्यातल्या एका म्हाताऱ्या स्त्रीला मी विचारले की माताराम हे कुणाचे शेत आहे ? तेव्हा तिने रामदयाळ कीर असे मालकाचे नाव सांगितले .  परंतु तो तर गावाला गेला असून दोन दिवसांनी परत येईल हे देखील तिने सांगितले . काय झाले असे विचारल्यावर मी तिला सांगितले की त्याने शेतामध्ये केलेली सुंदर मार्गक्रमणा एका परिक्रमावाशाला फार आवडली  आणि त्याने तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले आहेत असे त्याला सांगा . असे मी सांगेपर्यंत समोरून मोटरसायकल वरून एक साधारण पन्नास पंचावन्न वर्षाचा मनुष्य येताना दिसला त्याबरोबर माताराम म्हणाली हे काय रामदयाळ कीर स्वतः येत आहेत ! मला पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि नर्मदे हर केले . आपण गावाला गेला होता ना ? असे विचारल्यावर तो म्हणाला की जाणार होतो . परंतु अचानक असे वाटले की आज नको उद्या जावे म्हणून मी परत माघारी आलो . प्रत्यक्षात याची भेट व्हावी अशी मनापासून इच्छा निर्माण झाली होती ती मैयाने पूर्ण केली .दुसरे काय ! मी त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना सांगितले की आपण आपल्या शेतातून परिक्रमावासी जावेत म्हणून जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे मी अतिशय प्रभावीत , अचंबित व तितकाच आनंद झालेलो आहे ! तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारी ही कृती तुमच्या हातून घडलेली आहे ! त्याला देखील खूप आनंद झाला आणि त्याने चहा पिऊन जाण्याची विनंती केली . वाळू उपसा करणाऱ्या लोकांना चहा विकणारी एक छोटीशी झोपडी वजा टपरी तिथे होती . तिथे आम्ही दोघे चहा पीत बसलो . रामदयाळ ने त्याची कथा थोडक्यात मला सांगितली .तो देखील पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणे माझी जमीन , माझे शेत वगैरे करत असे . एकदा एका नागा साधूने, ह्याने साधूला अडवल्यावर त्याचे प्रबोधन केले आणि तिथून पुढे त्याची बुद्धी पालटली . त्याने ज्या दिवसापासून परिक्रमा वासी आणि पर्यायाने नर्मदा मैया ला जाण्यासाठी त्याच्या शेताचे दरवाजे खुले केले ,त्या दिवसापासून त्याची अतोनात प्रगती झालेली आहे . केवळ शेती करणारा हा मनुष्य आता स्वतःचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीज , काही नावा आणि काही वाळू उपसणारे कामगार इत्यादी गोष्टींचा मालक झालेला आहे . ही सर्व मैयाची कृपा आहे असे तो मानतो . कोणी परिक्रमावासी योगायोगाने या शेतातून गेलाच तर त्याने कृपया मोबाईलवर या रामदयाळ कीर या सद्गृहस्थाची मुलाखत घेऊन तिचा नर्मदा खंडामध्ये प्रसार करावा . ज्यामुळे इतर शेतकरी देखील यातून प्रेरणा घेतील . कारण अशा पद्धतीने परिक्रमावासींचे फलक लावून पायघड्या घालून , स्वागत करणारा हा पहिला व शेवटचा शेतकरी मला भेटला . असो .याला नर्मदेहर करून पुढे निघालो .
इथून थोडेसे पुढे आलो आणि एका आश्रमाने घातलेले कुंपण लागले . शेतकरी कुंपण घालून मार्ग अडवितात हे समजून घेण्यासारखे होते . परंतु आश्रमाने स्वतःसाठी खाजगी घाट निर्माण केलेला पाहून फार वाईट वाटले . इथे मी अक्षरशः गुडघाभर पाण्यात शेवाळलेल्या दगडांमध्ये जीव धोक्यात घालून तो घाट ओलांडला . इथून पुढे नेमावर पर्यंत म्हणजे हंडीया नेमावर पूल लागेपर्यंत अनेक आश्रमांची निर्मिती झालेली आहे . मी परमहंस आश्रमात चहा घेऊन पुढे निघालो . अडगडानंद महाराज म्हणून एक संत आहेत . यांनी यथार्थ गीता नावाचे पुस्तक लिहिलेले असून मी ते पूर्वी वाचलेले आहे आणि मला काही फारसे भावले नाही हे स्पष्टच सांगतो . विनाकारण गीतेत सर्वधर्मसमभाव घुसविण्याचा प्रयत्न या पुस्तकांमध्ये अश्लाघ्यपणे केलेला दिसतो आणि तो केविलवाणा ठरतो . सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकम् शरणम् व्रज ।  असे सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला आपण सर्व धर्म समभावाचा उपदेश करणे हे हास्यास्पदच नाही काय ?  अर्थात हा अडगडानंद महाराजांचा आश्रम आहे हे मला नंतर बाहेर गेल्यावर कळाले . इथून पुढे अनेक सुंदर सुंदर आश्रम आहेत . 
 मी काही तेथे थांबलो नाही . परंतु वाचकांना त्या आश्रमांची माहिती असावी आणि कोणी चुकून माकून परिक्रमेला गेलेच तर हे आश्रम आवर्जून पाहता यावेत म्हणून त्यांची थोडक्यात माहिती इथे देऊन ठेवत आहे .
नर्मदा बाकुल संगमावरील परमहंस आश्रम
स्वामी अडगडानंद महाराज
भमोरीचा हरिहर आश्रम नितांतसुंदर आहे
हरिहर आश्रमाचे सुंदर प्रवेशद्वार आणि उत्तम सारवलेली जमीन
आश्रमामध्ये साधू असे जमिनीवर बसतात .
याच्यापुढे लागणारा रामेश्वर आश्रम म्हणजे एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा आहे
अतिशय उत्तम दर्जाचे लाकडी बांधकाम येथे पाहायला मिळते
दक्षिण भारतीय शैलीचा विशेषतः केरळ राज्यातील शैलीचा प्रभाव येथे जाणवतो त्यामुळे भरपूर लाकूड जांभा खडक वापरला आहे .
आश्रम नीटनेटका व स्वच्छ सुंदर आहे 
आश्रमाचे सौंदर्यदृष्टीने अवलोकन केले असता हा फारच उत्तम रीतीने बांधलेला आहे
आश्रमातील बैठक व्यवस्था
इथून काठाने बरेच अंतर पुढे गेल्यावर पुन्हा एक सुंदर आश्रम लागतो .श्री शिव करुणा धाम अन्नक्षेत्र असे त्याचे नाव आहे .
हे नागरशैलीतले एक महादेवाचे मंदिर असून नर्मदेच्या अगदी काठावर असल्यामुळे जाताना दिसतेच . 
सुंदर कोरीव काम केलेले दगडी मंदिर आणि भव्य त्रिशूल लक्ष वेधून घेतात
मंदिराचे कोरीव काम आकर्षक आहे
महादेवासमोरील त्रिशूल फारच भव्य आहे . काशी विश्वनाथा समोर साधारण असाच त्रिशूल आहे .
नर्मदेश्वर महादेव
मंदिर सुंदर तटबंदीने बंदिस्त आहे
परिक्रमा मार्गावरून होणारे दर्शन
भारतीय वास्तू शिल्पकलेचा एक सुंदर नमुना
या खेरीज काठाकाठाने चालताना अशा देखील काही सुंदर तपःपूत जागा आपल्याला या मार्गात आढळतात .
वाटेतील एका आश्रमातील भव्यवृक्ष
कल्पांत काळी सुद्धा ' न मृता ' होणारी म्हणून नर्मदा असे हिचे नाव पडले आहे , हे सांगणारा रेवा पुराणातील श्लोक
चालता चालता दिवस मावळ तिकडे गेला आणि नर्मदा मातेचे नाभीकुंड मधोमध दिसू लागले . इथे नर्मदा मातेचे पात्र भलतेच विस्तीर्ण दिसत होते . कुठे ते अत्यंत खोल तर कुठे अतिशय उथळ होते . नर्मदा काठी आतापर्यंत असलेला कुरतडल्या सारखा असमान किनारा एकदम हिरवा गार गवताचा झाला . आणि पुन्हा नाभीकुंडापाशी खडकांची दाटी दिसू लागली . नर्मदा पात्राच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे नाभी कुंड दिसत होते . याचा अर्थ अमरकंटक पासून नर्मदा मातेचा मध्यबिंदू आज तिने गाठून घेतला होता ! मोठ्या आवाजात नर्मदेचा जयजयकार केला ! तिला साष्टांग प्रणिपात केला . आणि आता आधी स्नान आटोपून घ्यावे आणि मगच आश्रम शोधावा असे ठरविले . काठावर बसून आनंदाने स्नान केले . आणि एका गुराख्याला विचारले की इथे कुठला आश्रम आहे ? त्याने सांगितले या गावांमध्ये भरपूर आश्रम आहेत परंतु तुम्ही पागल बाबा आश्रमात जा . पागल बाबा हे नाव मला मजेशीर वाटले आणि मी चौकशी करत निघालो . नाभीकुंडापासून जवळच पागल बाबांचा आश्रम होता .डाव्या हाताला नर्मदा मंदिर होते . मध्ये एक ओढा वाहत आला होता आणि मागे पेडीघाट राम मंदिर होते . 
नर्मदा नदीच्या मधोमध दिसणारे नाभी कुंड , त्यानंतर दिसणारा हंडीया नेमावर पूल आणि  खाली काठावरचा पागल बाबा आश्रम व समोरील हिरवेगार मैदान
याचा अर्थ मी स्नान केले तो पेडीघाट होता . हिरव्यागार झाडीमध्ये एका डोंगरावर लपलेला पागल बाबा आश्रम उंचच उंच जिन्या वरून खुणावत होता . धावतच वरती गेलो आणि छोटासाच परंतु नीटनेटका आश्रम पाहून मन प्रसन्न झाले . इथे ओसरी मध्ये झोळी टेकवली आणि समोर बसलेल्या एका वयस्कर महाराजांनी नर्मदे हर म्हणत स्वागत केले . हा संपूर्ण परिसर नक्की कसा आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरील काही सुंदर चित्रे सोबत जोडत आहे . नर्मदा परिक्रमे मधील हे एक अत्यंत महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे .
नर्मदा मातेच्या मधोमध असणारे नाभिकुंड . इथे केवळ नावेनेच जाता येते . मध्यभागी नाभीच्या आकाराचे शिवलिंग आहे .दुर्दैवाने परिक्रमावासी येथे जाऊ शकत नाहीत . परंतु आपण अवश्य दर्शन घ्यावे !
डावीकडे हंडीया नेमावर पूल दिसतो आहे आणि खाली हंडिया घाट दिसतो आहे . उजवीकडे हिरवेगार गवताचे मैदान आणि नर्मदे मध्ये दिसणारे खडक .
हंडिया घाट सतत भक्तांनी गजबजलेला असतो
 हंडिया नेमावर पुलावरून दिसणारे खडकाळ नर्मदा पात्राचे दृश्य
हे आहे हंडीया घाटाचे आणि पुलाचे विहंगम दृश्य
समोरच्या बाजूला अर्थात उत्तर तटावर दिसणारा नेमावर घाट व सुंदर कलाकुसर असलेले मंदिर
समोरच्याच उत्तर तटावर एका जैन मंदिराची निर्मिती चालू असून ते मंदिर आकाशातून असे दिसते
परिक्रमा मार्गावरून चालताना मात्र हे मंदिर असे दिसते

हे चित्र उत्तर तटाच्या बाजूने घेतलेले आहे आणि आपण दक्षिण तटावरून चालत आहोत . पुढे नर्मदा समुद्राकडे कशी वाहत जाते ते येथे दिसते आहे
या चित्राच्या मधोमध दिसणारे पांढरे शुभ्र नाभीकुंड .हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला नर्मदेचे पात्र किती विस्तीर्ण आहे याची कल्पना यावी .समोरच्या झाडीमध्ये पागल बाबा आश्रम लपला आहे .
तिकडून नर्मदा आपल्याकडे येते आहे .समोरच्या तटावरून आपण चालत निघालो आहोत .मध्ये एका पुलाचे काम चालू आहे पहा .
 हाच तो निर्माणाधीन पूल
 नाभी कुंडाकडे घेऊन जाणारी बोट
महापुरामध्ये हे नाभीकुंड जलमग्न असते
पागल बाबा आश्रमामध्ये पागल बाबा नावाच्या संतांची संजीवन समाधी होती .गेल्यावर ज्यांनी माझे स्वागत केले ते अगरवाल बाबाजी इथे सेवेसाठी म्हणून राहतात . त्यांचे वय सुमारे ८० वर्षाचे आहे . परंतु तरीदेखील कितीही परिक्रमावासी आले तरी ते अतिशय मनोभावे त्यांची सेवा करतात आणि त्याच्या बदल्यात इथले जे पुजारी आहेत ते शर्माजी यांना सांभाळतात .अगरवाल बाबांनी मला पागल बाबा या नावाचा रंजक इतिहास सांगितला .कुंभमेळ्यासाठी प्रयागराज संगमावर निघालेले काही साधू एकदा नागपूरला एका धनिकाकडे थांबले .त्याने साधूंची मनोभावे सेवा केली . त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन तुला हवा तो वर माग असे साधू महाराज म्हणाले असता , "अब्जावधीची संपत्ती सांभाळायला मला वारस नाही " असे ते धनिक म्हणाले . "पुत्रवान् भव । " असा आशीर्वाद देऊन साधू पुढे निघून गेले . पुढच्या कुंभमेळ्यासाठी जेव्हा हा जथा पुन्हा इथे आला तेव्हा धनिक महाराजांना तीन मुले झालेली होती . त्यातील धाकटा पुत्र तू आम्हाला दे असे साधू महाराजांनी सांगितले . आता लौकिक अर्थाने पाहायला गेले तर इतकी सारी अब्जावधी रुपयांची संपत्ती असून हा मुलगा साधू झाल्यामुळे लोक त्याला पागल बाबा म्हणू लागले ! त्या पागल बाबांची ही समाधी होती .
परमपूज्य श्री पागल बाबा हंडीया
इथे शर्मा नामक एक तेजस्वी ब्राह्मण कुटुंब सर्व व्यवस्था पाहते . त्यांना परम आणि भास्कर नावाची दोन मुले होती आणि रक्षा शर्मा नावाची त्यांची आते बहीण देखील शिक्षणासाठी तिथेच राहिली होती .मुले अतिशय हुशार चुणचुणित आणि आश्रमकर्तव्यदक्ष होती . मुले माझ्याशी गप्पा मारत बसली . त्यांनी मला तो संपूर्ण परिसर फिरवून दाखवला . इथून मैयाचे सुंदर दर्शन होत होते . मया मध्ये पाण्याचा पाईप टाकून थेट मोटर लावून पाणी खेचायची व्यवस्था यांनी केलेली होती .त्यामुळे उद्या सकाळी नळी खालीच आंघोळ करा असे त्यांनी मला सांगितले . अगरवाल बाबांनी तीन वर्षे तीन महिन्यात तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केलेली होती . ते देखील त्यांच्या परिक्रमेमधील अनुभव मला सांगत बसले . मला महादेव पिपरिया येथे सापडलेले शिवलिंग मी त्यांना दाखवल्यावर त्यांना अतोनात आनंद झाला ! त्यांनीच मला त्याच्यावर असलेले त्रिपुण्ड्र आणि त्रिशूल वगैरे शोधून दाखविले . आणि याचे नाव आज पासून नर्मदेश्वर आहे असे मला सांगितले . हे शिवलिंग अतिशय दुर्लभ असून कोणालाही देऊ नकोस असे त्यांनी मला आवर्जून सांगितले . त्या रात्री आश्रमामध्ये मी एकटाच होतो . अतिशय सुग्रास भोजन मला देण्यात आले . मुलांचे वडील तिथे नव्हते कारण जवळच एका डोंगरावर मंगळ देवाचे भव्य मंदिर यांनी बांधले आहे तिथे ते गेले होते .परंतु मुलांनी वडिलांची कमतरता भासू दिली नाही . 
मी मुक्काम केलेली पागल बाबांची ओसरी . समोर नर्मदा मैया आणि नळीने इथपर्यंत आणलेले नर्मदा जल .इथे भिंतीवर कोरलेली अर्धशिल्पे मोठी मजेशीर होती . बासरी वाजवणारा कृष्ण ऊस खातो आहे की काय असे वाटत होते !
आश्रमामध्ये एक पांढरा रंगाचा कुत्रा होता त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कुत्र्याला कुत्ता कोणीही म्हणत नाही तर भैरव असे म्हणतात . घराच्या बाहेर भुंकून आवाज करतो अर्थात बही रव करतो म्हणून तो भैरव . काही लोक या नावाचा संबंध काळभैरवाच्या वाहनाशी देखील लावतात . असे अनेक भैरव तुम्हाला परिक्रमेमध्ये मार्गदर्शन करतात हे मात्र खरे . अग्रवाल बाबा अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचे खुमासदार स्वभावाचे होते आणि त्यांचे डोळे अतिशय सुंदर होते . भल्या पहाटे उठून मी नळी खाली आंघोळ केली . स्नान पूजा आटोपून शांत बसून राहिलो .
आश्रमाच्या मागे काहीतरी गडबड चालू आहे असे मला वाटल्यामुळे मी मुलांना विचारले असता त्यांनी सांगितले की आश्रमाच्या भिंतीला लागूनच दोन मोठ्या कबरी आहेत .
आश्रमाच्या गच्चीवर सुंदर अश्वारूढ मूर्ती होती .हे जृंभेश्वर होते . ही मूर्ती पाहण्यासाठी वर गेल्यावर मला मागे असलेली थडगी दिसली .
पवित्र नर्मदा मैया काठी असलेली दोन थडगी
मुल्ला दो प्याजा नामक रचना करणाऱ्या अकबराच्या दरबारातील अब्दुल हसन नावाच्या कुण्या इसमाची ही मजार होती . परंतु दो नावाचा फायदा घेत दोन कबरी ठोकल्या होत्या .
परिसरातल्या कबरींची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे हे मला स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले . 
अगरवाल महाराजांना या कबरींबाबत काहीच कल्पना नव्हती . अर्थात ते अपेक्षित देखील होते . सर्वसाधारण हिंदू मनुष्य शक्यतो चौकसपणे आजूबाजूला काय घडते आहे याची माहिती ठेवायचा प्रयत्न करत नाही .कालाय तस्मै नमः । रात्री उशिरा शर्मा पुजारी देखील आले आणि माझी आवर्जून भेट घेऊन मगच झोपायला गेले .
सकाळी अगरवाल बाबांनी मला चहा करून दिला आणि मग मी नर्मदे हर केले ! 
इथून पुढे नर्मदेचा किनारा सोडावा लागतो असे मला सांगण्यात आले होते . त्यामुळे मला मनापासून आतोनात दुःख होऊ लागले होते . कारण पुनासा नावाचे नर्मदा नदीवरील सर्वात मोठे धरण इथून पुढे लागते . आणि त्याचा विस्तार इतका अवाढव्य , आडवा तिडवा आणि अजस्त्र आहे की परिक्रमा मार्ग असा शिल्लकच राहिलेला नाही .  अत्यंत जड अंत:करणाने हंडीया घाटावर नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि साश्रु नयनांनी तिच्याकडे पाठ फिरवली . आता पुढील पाच दिवस तिचे दर्शन दुरापास्त होणार होते .


लेखांक एकसष्ठ समाप्त ( क्रमशः )

लेखांक ६२ : अति विस्तीर्ण पुनासा धरणामुळे बदललेला मार्ग आणि बावरचे आनंदस्वामी

नर्मदा नदीवर अनेक छोटी मोठी धरणे आहेत. अमरकंटक इथे घातलेले छोटेसे बांध सोडून द्या .परंतु ज्याला खरोखरच धरण म्हणता येईल असे पहिले धरण म्हणजे बर्गी बांध आहे . ज्याला राणी अवंतीबाई बांध असे नाव आहे . त्यानंतर पुनासा गावातील पुनासा धरण किंवा इंदिरा सागर आहे . ओंकारेश्वर येथे देखील छोटेसे धरण आहे . त्यानंतर बांधून अर्धवट पडलेले परंतु कार्यान्वित न झालेले लेपा धरण आहे . आणि नर्मदा बचाव आंदोलनामुळे जगप्रसिद्ध केले गेलेले सरदार सरोवर धरण हे एक धरण आहे . एकूण लहान मोठी एकूण लहान मोठी तीस धरणे नर्मदेवर आहेत . आता या प्रमुख धरणांचे उपग्रह नकाशे मी खाली जोडत आहे . आणि ते जोडताना मी स्केल अर्थात अंतर एकाच एककात ठेवलेले आहे .त्यामुळे तुम्हाला आकाराची तुलना करायला सोपे जाईल . या सर्व नकाशांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पुनासा धरण हे किती अजस्त्र आणि भव्य दिव्य आहे .
 बर्गी धरण
ओंकारेश्वर धरण
सरदार सरोवर धरण
 पुनासा धरण
स्थापत्य अभियंते आणि जिज्ञासू यांच्यासाठी धरणांची तांत्रिक माहिती देतो आहे ज्यामुळे तौलनिक अभ्यास सोपा जाईल .

सरदार सरोवर धरणाची भिंत १२१० मि लांब व १६३ मि उंच आहे . याचा पाणीसाठा सुमारे ८८००० चौरस किमी मध्ये पसरलेला असून पाण्याची विसर्ग क्षमता ३० लक्ष  क्युसेक इतकी आहे .  ३३४ टीएमसी पाणीसाठा असलेले हे धरण १४५० मेगावॅट विद्युत निर्मिती करू शकते . (सर्व आकडे सरदार सरोवर धरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेले आहेत )

जबलपूर जवळचे बर्गी धरण ६९ मिटर उंचीचे असून त्याची भिंत सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीची आहे . साडेचौदा हजार चौरस किलोमीटर विस्तार आणि
१३८ टीएमसी पाणीसाठा असलेले हे धरण असून १०५ मेगवॅट विद्युत निर्मितीची याची क्षमता आहे .

पुनासा धरण ९२ मीटर उंच असून त्याची भिंत ६५३ मिटर रुंद आहे . ४३२ टीएमसी पाणीसाठा असणारे हे धरण ६१६४२ चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे . 
१००० मेगावॅट विद्युत निर्मितीची क्षमता या धरणाची आहे .
तुलनेने नगण्य आकाराचे असूनही ओंकारेश्वर धरण देखील ५०० मेगावॅट वीज तयार करू शकते , याला तिथला मैयाचा भौगोलिक उतार व प्रताप कारणीभूत आहे .
आकडेवारीचाच खेळ बघायचा झाला तर पुनासा धरणाचा पृष्ठभाग साधारण हजार चौरस किलोमीटरचा आहे . आणि सरदार सरोवर केवळ ३०० चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे . त्यातही सरदार सरोवर धरण अतिशय खोल अशा दऱ्यांमध्ये पाणी साठवते तर पुनासा धरण हे पसरलेल्या शेतजमिनी आणि सुमारे ४०००० हेक्टर वनक्षेत्र खाऊन पाणी साठवत आहे . त्यामुळे याचा विस्तार फारच आडवा-तिडवा भासतो . तूर्तास पुनासा धरण हे भारतातील सर्वात जास्त जलधारण क्षमता असलेले धरण मानले जाते . असो .
तर या धरणामुळे नर्मदा मातेचा काठ सोडून हंडिया गावातून मार्ग बदलावा लागतो . अर्थात हा मार्ग देखील काठाकाठानेच आहे परंतु नर्मदा मातेचे अखंड होणारे दर्शन मात्र इथे होत नाही . त्यासाठी चार-पाच दिवस चालावे लागते . तसे हे अंतर आठवड्याभराचे किंवा दहा दिवसाचे आहे . परंतु इथून पुढे माझ्या पायांना काय झाले मला कळाले नाही परंतु प्रचंड गतीने हे अंतर माझ्याकडून मैयाने कापून घेतले . तिच्या काठावरून चालताना टंगळमंगळ करणारी पावले ती दिसत नाही म्हटल्यावर चौपट गतीने चालू लागली ! 
 हांडिया घाट व पूल
हांडिया घाट चढल्याबरोबर डाव्या हाताला एक अतिशय प्राचीन शिवालय आहे . जिथे हंडीया चा पूल सुरू होतो अगदी त्याच बिंदूला हे देवालय असून याची स्थापना कुबेराने स्वतः केली आहे अशी मान्यता आहे .
पूल संपताना डाव्या हाताला मंदिर दिसू लागते . केशरी कमान म्हणजे हंडया घाटाचे प्रवेशद्वार आहे .
हे मंदिर प्राचीन व संरक्षित स्मारक आहे
श्री ऋद्धनाथ असे या महादेवाचे नाव आहे . मंदिर छोटेसेच असले तरी अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे . 
सुबक सुंदर रिद्धनाथ महादेव मंदिर हंडीया
 ॐ रिद्धनाथाय नमः ।
इथे काही काळ दर्शन वगैरे केले . शिवमहिम्न , शिवमानस पूजा , शिवपंचाक्षर स्तोत्र आदि शिवस्तुती गायली आणि पुढे मार्गस्थ झालो . खूप दिवसांनी प्रथमच डांबरी रस्ता दिसत होता . नर्मदेच्या काठावरील मऊशार थंडगार मातीतून चालणाऱ्या पायांना हा कडक तापलेला डांबरी रस्ता अजिबात आवडत नव्हता . नर्मदा समांतर असलेल्या एका रस्त्याने चालत राहिलो . बरेच अंतर चालल्यावर डाव्या हाताला डोंगरावर मंगळ नाथाचे मंदिर दिसू लागले . काल मी मुक्काम केला त्या शर्मा पुजाऱ्याने हे मंदिर उभे केले होते . तिथे दर्शन घेऊन पुढे जा असे त्याने सांगितले होते . डोंगर खडा व कठिण होता . दुरून डोंगर साजरे ! 
 डोंगरावरील हिंडोलनाथ बाबा / मंगळनाथ बाबा
वर जाण्यासाठी खडा चढ आहे
 खडकांचा रंग वेगळाच आहे .
मंगळनाथाचे नूतन शिवलिंग अतिशय सुंदर ,भव्य आणि वैचित्र्यपूर्ण आहे . याची जलहरी त्रिकोणी आकाराची आहे .

डोंगरा वरून समोर दिसणारी नर्मदा मैया आणि डोंगरावरचा भव्य त्रिशूल
डोंगरावरील मंदिर
निर्मनुष्य डांबरी रस्त्याने चालताना अचानक एका माणसाने हाक मारली .नर्मदे हर केले आणि चहा पिण्यासाठी घरी चलण्याची विनंती केली . याचे नाव सत्यनारायण धनगर असे होते .धनगर हे आडनाव इथे सर्वत्र लावतात. मांगरुल नावाच्या गावामध्ये याच्या घरी सुरेख चहा त्याने पाजला . मांगरोल नावाचे एक गाव पुढे नर्मदे काठी लागते ते वेगळे आणि हे वेगळे .इथपासूनच नर्मदेमध्ये मगरी चालू होतात . महाराष्ट्रा मध्ये देखील या नावाची गावे आहेत . मंगरूळपीर किंवा मंगरूळ दस्तगीर अशी दोन गावे विदर्भामध्ये आहेत . मेंगलोर असे आपण ज्याला म्हणतो ते कर्नाटकातील कारवार प्रांतातील गाव ,त्याचे मूळ नाव मंगळुर असेच आहे . उर म्हणजे गाव .पूर म्हणजे शहर . मंगळाचे गाव म्हणून मंगळूर . इथले मांगरुल त्याच शब्दाचा अपभ्रंश असावा असा माझा अंदाज आहे . सत्यनारायण धनगराने मला पुढील सर्व रस्ता समजावून सांगितला . त्याने मला सांगितले की जर मी त्याने सांगितलेला मार्ग घेतला तर आज रात्रीच्या मुक्कामापर्यंत मी बावर नावाच्या गावाला देखील पोहोचू शकतो . इथे त्याचे मेहुणे माणेकचंद यांनी आनंद स्वामी नावाच्या एका महाराजांना आश्रम उभा करून दिलेला होता. मार्ग असा होता मांगरूल इथून सातातलाई ,जामुनी ,पचोला , कचबेडी ,पाचातलाई , सोनतलाई ,बावर .भरपूर चालत मी रातातलाई गावामध्ये आलो . रातातलाई गावामध्ये एका टेकडीवर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे .
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती राता तलाई
उत्तर भारतामध्ये मारुतीला बालाजी असे म्हणतात आणि त्याचा अतिशय सुंदर असा साजशृंगार करण्याची पद्धत इथे आहे
इथे प्रेम पटेल नावाच्या एका जमीनदाराने मला चहा पिण्यासाठी घरी नेले . कुठल्याही घरात जाताना मी पादत्राणे बाहेर काढून ठेवत असे . तसे मी बूट काढल्याबरोबर फाटलेल्या मोजातून बाहेर आलेले माझ्या पायाचे अंगठे त्याने पाहिले . आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला ! त्याने मुलाला एवढेच सांगितले की काल जी गोष्ट आपल्याला नको होती आणि तरी देखील आपण विकत घेतली ती आतून घेऊन ये .त्याच्या मुलाने धावतच आत मध्ये जाऊन नवे कोरे मोजे माझ्यासाठी आणले . पटेल सांगू लागला की काल बाजारासाठी ते हरदा शहरात गेले होते . शॉपिंग करताना हे नवे कोरे अडीचशे रुपयांचे उंची मोजे त्याने विनाकारण घेतले . मॉलच्या काउंटरवर त्याने हे मोजे परत सुद्धा केले . परंतु पुन्हा त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी ते मोजे ठेवून घेतले . आज माझे पाय बघितल्या क्षणी त्याला आठवले की हे मोजे बहुतेक या माणसासाठीच आपल्याला मैय्याने दिले ! मी मोजे घातल्यावर ते चांगले नडगीपर्यंत पोहोचत होते . कापड जाड होते आणि थंडी वाजत नव्हती . 
 प्रस्तुत लेखकाचे जुने फाटू लागलेले मोजे
 नर्मदाभक्त प्रेम पटेल , गाव रातातलाई यांनी दिलेले अप्रतिम मोजे

उत्कृष्ट दर्जाचे ते मोजे दिल्याबद्दल मी प्रेम पटेल यांचे आभार मानले . आणि पुढे निघालो . 
चालता चालता दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडू लागले . इतका रस्त्यावर समोरच एका पाटीने लक्ष वेधून घेतले .
दिवाणजी जाट यांचे जय मा नर्मदा अन्नक्षेत्र
दिवाणजी जाट नावाचे एक शेतकरी आणि त्यांचे भाऊ दोघे मिळून त्यांच्या शेतावरती परिक्रमावासींना रोज भोजन प्रसाद देत असत . शेतातच छोटासा मांडव टाकून अतिशय सुंदर विश्रांतीची व्यवस्था त्यांनी केलेली होती . दोघे भाऊ स्वतः स्वयंपाक करायचे आणि सर्वांना जेवायला वाढायचे . आता देखील तिथे आधीच काही परिक्रमावासी येऊन थांबले होते . बंगाली बाबूंची ताटातूट झाली होती आणि एकटा सात्यकी रॉय तिथे पोहोचला होता . सर्वांना बटाट्याची भाजी ,टिक्कड , लोणचे ,पापड असे सुंदर जेवण जाट बंधूंनी दिले .
स्वतःच्या खिशातून खर्च करून हे लोक अन्नदान करतात ही फार मोठी गोष्ट आहे . 
अन्य एका मार्गावर लावलेली त्याच अन्नक्षेत्राची पाटी
दिवाणजी जात बंधू आणि त्यांनी शेतातच तयार केलेली सुंदर कुटी
या जाट बंधूंचा स्वतःचा हार्वेस्टर होता . मी इतके दिवस मैया काठच्या छोट्या छोट्या शेतांच्या तुकड्या मधून चालत असल्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा पाहिलेला नव्हता . परंतु इथे जमिनीवर मोठी मोठी शेती असल्यामुळे हार्वेस्टर नावाचे राक्षसी यंत्र वापरले जाते . यातील बरेचसे हार्वेस्टर पंजाब मधून इथे हंगामा पुरते येतात आणि भरपूर कमाई करून परत पंजाबला निघून जातात . परंतु जाट बंधूंनी डोके लावून स्वतःचा हार्वेस्टर विकत घेतला होता . त्यातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत होते असे ते म्हणाले . फक्त या क्षेत्रामध्ये पंजाबी लोकांची एकाधिकारशाही असून एखादा सुटा भाग मिळवायचा झाला तर फार मिनतवाऱ्या कराव्या लागतात असे देखील त्यांनी सांगितले . भोजन झाल्यावर थोडीशी विश्रांती घेतली आणि पुढे खूप चालायचे आहे हे लक्षात घेऊन निघण्याचा निर्णय घेतला . आता सगळा फुफाट्याचा मार्ग लागला होता . इथून चालताना मध्येच एका घराच्या दाराला असलेल्या छोट्याशा फटी मधून एक छोटी मुलगी बाहेर आली आणि खाऊ मागू लागली . मी तिला खाऊ दिला . नंतर तिचा छोटा भाऊ आणि आई देखील बाहेर आले .मी पुढे निघून गेलो .सात्यकी ने त्या घराचा फोटो काढून फेसबुक वर टाकला होता तो आपल्यासाठी टाकत आहे . परिक्रमेमध्ये पाहिलेले घर आणि घर ,मंदिर आणि मंदिर , आश्रम आणि आश्रम , झाड आणि झाड , पार अन पार जसा आहे तसा आठवतो हे एक मोठे आश्चर्यच आहे ! सुदैवाने मी रोजनिशी लिहीत असल्याचा देखील मला फायदा झाला . परंतु 'ग्राफिकल किंवा पिक्चोरियल मेमरीअसल्याचा हा परिणाम असावा . असो .
हाच तो मातीने भरलेला रस्ता आणि त्यावर मला खाऊ मागणारी छोटी मुलगी . सोबत तिचा भाऊ आणि तिची आई .
पुढे जाणाऱ्या फुफाट्याच्या रस्त्याचा सात्यकीने काढलेला फोटो . तो परिक्रमा करत नसल्यामुळे हातामध्ये दंड बाळगण्या ऐवजी त्याने अशी 'ट्रेकिंग स्टिक ' आणली होती . परिक्रमे मध्ये अशा काठीला परवानगी नसते किंबहुना असे समजा की ही काठी काही कामाची नसते . किमान काना एवढ्या उंचीचा दंड हवाच . 
मी माझ्या नियमानुसार एकटा चालत पुढे निघून गेलो होतो . इकडे मागून एक बैलगाडी जोरात येते आहे असं मला आवाज आला . म्हणून मी घाईने बाजूला झालो आणि बघतो तर काय बैलगाडी मध्ये स्वतः सात्यकी रॉय विराजमान झालेला आहे ! त्याने गाडी थांबवायला लावली आणि मला म्हणाला चल हा गाडीवाला देखील बावरपर्यंत चालला आहे . मी त्याला सांगितले की परिक्रमे मध्ये वाहनाने जायचे नसते त्यामुळे तू पुढे जा मी काही येणार नाही . मग सात्यकी ने एक डोके लावले . तो मला म्हणाला तुझे ओझे गाडीत ठेवायला दे आणि तू चालत ये . मी तसेही नर्मदा मातेची ,पूजा साहित्याची आणि पुस्तकांची एक वेगळी झोळी करून ती गळ्यामध्ये लटकवायचो . ती शबनम पिशवी आणि दंड हाच खरा परिक्रमेचा ऐवज होता . त्यामुळे बाकीचे जड सामान व गोळा केलेली दगडी शिवलिंगे असलेली झोळी मी बैलगाडीमध्ये ठेवून दिली . नर्मदा माता नेहमी आपल्या सोबतच ठेवायची असते. गाडीवान मुलगा अतिशय तरुण होता .तो विकत घेतलेला नवीन बैल दाखवण्याकरता सासरेबुवांकडे निघाला होता . याचा जुना बैल शर्यतीमध्ये पळणारा होता . त्याच्यासोबत नवीन बैलाला पळण्याचा सराव देखील व्हावा हा देखील त्याचा आजच्या प्रवासा मागचा एक हेतू होता . दोन्ही बैल अतिशय चपळ आणि चंचल होते . त्याने गाडी हाकली आणि मी गाडीच्या मागे चालायला सुरुवात केली . साधारण पंधरा-वीस किलो वजनाची पिशवी पाठीवरून उतरल्यामुळे मला जणू काही पंख फुटले आहेत असे वाटू लागले होते ! चालताना इतके हलके यापूर्वी कधीच वाटले नव्हते ! या बैलांची एक गंमत होती ! चालताना माझी गती जरा जरी वाढली तर ते देखील गती वाढवायचे . काही केल्या ते मला पुढे जाऊ देत नव्हते . त्या गाडीवाल्या मुलाने मला सांगितले की तुम्ही एक प्रयोग करून बघा . कितीही वेगाने यांच्या पुढे जाऊन दाखवा .  असे म्हणता क्षणी मी वेगाने धावायला सुरुवात केली . क्षणाचाही अवधी न दवडता दोन्ही बैलांनी वेगाने धाव घेतली . मागे बसलेला सात्यकी पार आडवा झाला ! ओरडू लागला ! तरी ते थांबले नाहीत ! शर्यतीमध्ये बैल काय वेगाने पळतात याचा अनुभव मी त्या दिवशी जवळून घेतला . त्या बैलांना भयानक वेग होता . ते संपूर्ण अंतर मी जवळपास धावतच पूर्ण केले . कारण बैलगाडी पुढे गेली म्हणून मी बैलगाडीला गाठायला जावे तर बैल पुन्हा पळायला लागायचे ! शेवटपर्यंत त्या बैलांनी मला पुढे जाऊ दिले नाही ! आज पाठीवरील भार हलका झाल्यामुळे प्रचंड गतीने चाललो आणि खूप मोठे अंतर तोडले . मधली गावे पार करताना काही ठिकाणी लोकांनी आम्हाला चहा पाजला . तिथे या बैलांना देखील हिरवा चारा आणून टाकायचे . आणि गाडीवाल्या मुलाला देखील चहा मिळायचा .  बैलांना बादली बादली पाणी प्यायला मिळायचे . नर्मदा मातेच्या सोबत चालणाऱ्या प्रत्येकाची सेवा नर्मदा खंडामध्ये होतेच होते ! या बैलांसोबत मी सुमारे २५ किलोमीटर तरी पळालो असेन . ते देखील दुपारचे जेवण विश्रांती वगैरे सर्व झाल्यानंतर . ती बैलगाडी आली नसती तर आज कुठल्याही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता येणे मला अशक्य होते . कारण मी ज्या गतीने आज चाललो त्या गतीने बैलगाडी नसताना अजिबात चाललो नसतो . समोर एखादे ध्येय दिसत असले की ते गाठण्यासाठी माणसाला गती प्राप्त होते  .ते ध्येय जितके कठीण तितकी गती अधिक ! वाटेमध्ये जामली नामक गावामध्ये एक आश्रम लागला .  या भागात परिक्रमावासींची फारशी सेवा करणाऱ्या संस्था आश्रम वगैरे नाही आहेत . त्यामुळे जे काही मोजके आश्रम आहेत तिथे आवर्जून लोक तुम्हाला थांबवतात . या आश्रमामध्ये चहा पिऊन झाल्यावर सात्यकीने बैलगाडी चालवायचा प्रयत्न केला आणि मी त्याचा फोटो काढला .
 हीच ती बैलगाडी . डावीकडचा नवा बैल व उजवीकडचा जुना बैल . गाडीवर बसलाय तो सात्यकी रॉय . मागे बाणाने दाखवलेली प्रस्तुत लेखकाची झोळी . डावीकडे उभा गाडामालक व त्याचा मित्र तसेच सेवादार ग्रामस्थ . हे छायाचित्र प्रस्तुत लेखकाने काढलेले आहे . 
इथून बैलगाडा मालक निघून गेला . त्याने जाताना माझे खूप कौतुक केले . तो म्हणाला शक्यतो परिक्रमावासींना बसा म्हणलं की ते गाडीत बसतातच . मी गाडीमध्ये अजिबात बसणार नाही भले २५ किमी पळावे का लागेना , असा माझा निग्रह त्याला आश्चर्यकारक वाटला . परंतु या निमित्ताने मला सर्वांनाच एक सांगावेसे वाटते ,परिक्रमा करताना असा मोह अनेक वेळा होऊ शकतो की आपल्याला मनुष्य विचारतो आहे तर त्याच्या गाडीवर बसायला काय हरकत आहे . कोण पाहणार आहे ? असे तुम्हाला कधीही वाटू शकते . कोण पाहणार आहे ,या प्रश्नाचे उत्तर आहे , नर्मदा मैया पाहणार आहे ! ती सर्वसाक्षी ,सर्वव्यापी आहे . त्यामुळे थोडाफार गाडीने प्रवास करून किंवा आपले सामान पुढे पाठवून देऊन आपण मागे निवांत चालत येऊन परिक्रमा करू नये . मी चालताना पूर्ण वेळ माझ्या झोळीवरचा माझा हात काढलेला नव्हता . सोबत कमी सामान ठेवण्याचे महत्त्व काय आहे हे देखील मला त्या दिवशी कळले आणि इथून पुढे मी जमेल तितके सामान कमी कमी करत गेलो . 
जामली गावातील हेच ते जंभेश्वर नर्मदा सेवा आश्रम अन्नक्षेत्र
बरोबर सूर्य असताना जात असताना बाबर किंवा बाबरच्या आशीर्वाद मध्ये मी पोहोचलो होतो जंगलामध्ये असलेला सुंदर असा आश्रम आहे सत्यनारायण धनगर यांचे मेहुणे माणिकचंद यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा आश्रम उभा केलेला आहे अतिशय शांत , सुंदर , प्रशस्त आणि पवित्र आश्रम होता . इथे कपिलेश्वर महादेवाचे मंदिर होते आणि आनंद स्वामी नावाच्या संन्यासी महाराजांची निवासाची खोली होती . आश्रमाला संपूर्ण भिंत होती कारण जंगली श्वापदाचे भय होते . गेल्या गेल्या डाव्या हाताला स्वामीजी दरबार लावून बसायचे ती जागा होती . उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर त्यांची सुंदर अशी खोली होती . समोर महादेवाचे मंदिर होते . कपिल मुनींनी तपस्या केली म्हणून कपिलेश्वर महादेव .  त्याच्या शेजारी डाव्या हाताला परिक्रमावासींची उतरण्याची दोन मजली अतिशय सुंदर आणि प्रशस्त व्यवस्था होती . मी गेलो तेव्हा मोर्शी चा एक परिक्रमावासी आधीच येऊन उतरला होता . त्याचे काहीतरी वाचन चालू होते . आणि तो बऱ्यापैकी माणूसघाणा होता . त्यामुळे मी त्याच्याशी न बोलता स्वच्छ हात पाय तोंड धुवून आश्रम पाहायला बाहेर पडलो . आणि हो एक सांगायचे राहिले ! आपला बंगाली बाबू जामली आश्रमातच राहिला ! २५ किलोमीटर धावणाऱ्या बैलगाडी मध्ये बसून तो खूप थकला होता ! त्यामुळे पुढचे पाच किलोमीटर त्याने टाळले आणि मागेच मुक्काम केला ! या उलट माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की ती बैलगाडी थांबली नसती तर अजून दहा किलोमीटर नक्की गेलो असतो ! माणसाला प्रगती करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी नेहमी एका आलंबनाची अथवा आधाराची गरज असते हे अगदी खरे आहे ! 
चला तुम्हाला आश्रम फिरवून आणतो .
वरील नकाशा मध्ये दिसणारा निळा झेंडा म्हणजे जंगलाच्या मधोमध असलेला आपला बावरचा आश्रम असून नर्मदा मातेच्या जलसाठ्यापासून तो किती जवळ आहे हे आपण पाहू शकता . 
आश्रमातील कपिलेश्वर महादेव मंदिर . 
कपिलेश्वर महादेव
महादेव
श्री कपिल महामुनी
गणपती बाप्पा आपल्या वडिलांची पूजा करताना
आश्रमामध्ये असे सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत
मध्यभागी झाडाचा एक पार आहे आणि नागोबा आहे .डाव्या हाताला पांढरी टाकी दिसते आहे त्याच्या शेजारी दिसणाऱ्या इमारतीमध्ये मी मुक्काम केला होता . 
डावीकडे हनुमंतांच्या छोट्या मंदिराच्या मागे परिक्रमा वासी निवास
आश्रमातील हनुमान जी
संध्याकाळी आश्रमामध्ये आरती होती . इथे एक खूप मोठा शंख होता . मी आजपर्यंत अनेक शंका वाजवले परंतु इतका सुंदर शंख पाहिला नव्हता . सलग एक मिनिट तो शंख आरामात वाजवता यायचा . संपूर्ण आरती संपेपर्यंत मी तो शंख वाजवण्याचा पुरेपूर आनंद घेतला ! रात्री गावातील सेवादार लोकांनी येऊन अप्रतिम खिचडी बनवून खायला घातली . त्यानंतर महाराजांसोबत सत्संगाला बसलो . आनंद स्वामी अतिशय तेजस्वी संन्यासी होते आणि अतिशय गोड आवाजामध्ये भावपूर्ण गाणी गायचे . त्यांनी खूप मार्गदर्शन केले आणि भरपूर गाणी सुद्धा म्हटली . यांचे मार्गदर्शन घ्यायला खूप लोक यायचे . इथून पुढे हळूहळू वनवासी लोकांचे प्रमाण वाढत जाते . त्यामुळे त्यांच्याकडे येणारे भक्त देखील बहुतांश वनवासी किंवा बिश्नोई समाजाचे असायचे . महाराज अतिशय शांतपणे सर्वांना उत्तरे द्यायचे . महाराजांनी मला वरती नेऊन त्यांची कुटी दाखवली .पुस्तके दाखवली . मी खाली आल्यावर मंदिरातील शिष्य मंडळी मला सांगू लागली की महाराज वरती कोणालाच घेऊन जात नाहीत .
आश्रमातील महाराजांच्या कुटीकडे जाणारा जिना आणि महाराजांची कुटी
महाराज अतिशय शांत ,सात्विक ,विद्वान आणि अभ्यासू होते . त्यांची शांतता ही वादळानंतरची शांतता होती असे जाणवत होते ! खूप शोधूनही मला त्यांचा फोटो सापडला नाही यावरून त्यांची विरक्ती लक्षात यावी . त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो . सकाळी भल्या पहाटे उठून मागे असलेल्या जंगलामध्ये डोल डाल आटोपून आलो . जंगल फारच भयानक होते . प्राण्यांचा वावर असल्याच्या खुणा जाणवत होत्या . मी चुकीच्या वेळी तिथे गेलो होतो परंतु पर्याय नव्हता . शेजारीच गावाची वस्ती असल्यामुळे जंगलात जाण्याशिवाय पर्याय नव्हता . इथे एक बंद पडलेली शाळा देखील दिसली . आश्रमात असलेल्या टाकीखाली आंघोळ केली . पूजा वगैरे आटोपून आनंद स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन पुढचा मार्ग पकडला . आज खिरकिया या गावांमध्ये पोहोचायचे असे माझे नियोजन होते परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . तो दिवस कायमचा लक्षात राहिला .


लेखांक बासष्ठ समाप्त ( क्रमशः )

लेखांक ६३ : ब्रिजेश बिश्नोईचे अश्व आणि किशनगोपाल यादवचे ताक

जंगलातील मार्ग पकडला आणि झाडांवर दिसणारे बाण बघत चालायला सुरुवात केली . इथे परिक्रमा वासींना सोयीचे जावे म्हणून बरेच ग्रामस्थ काहीतरी खाणा खुणा करून ठेवत असतात . कधी झाडांना झेंडे लावतात कधी काटेरी फांद्यांमध्ये चिंध्या अडकवतात तर कधी असे बाण ठोकतात .
परिक्रमा मार्ग दिशादर्शक बाण
इथून जवळच बीवर गुफा अर्थात जमिनीखाली असलेल्या विवरातली मोठी गुहा आहे . इथे अनेक लोक दर्शनासाठी जात असतात . परंतु मी आता नाव बंद होण्याच्या आत समुद्र गाठण्याच्या तयारीला लागलो होतो .तरीदेखील त्या गुहेबद्दल मी सगळी माहिती स्थानिक लोकांकडून मिळवली . तशीच एक गुहा जवळपास होती ती देखील मला एकाने दाखवली परंतु ती खूपच लहान होती . 
 बावर च्या बीवर गुहेत शिरण्याचा भयप्रद मार्ग
गुहा आत मध्ये भव्य दिव्य आहे
पर्यटकांची आणि भक्तांची इथे कायम गर्दी असते
गुहेत उतरण्यासाठी अशा शिड्या बनवलेल्या आहेत
 बावरच्या बिवर गुफेत ध्यानस्थ बसलेला सात्यकी रॉय
" बावर बीवर " सोडून मी पुढे निघालो . आता वेगाने चालत खिरकिया हे गाव गाठायचे हे डोक्यात होते . या नावाचे रेल्वे स्टेशन येताना लागले होते . तसेच इथे धुक्यामुळे रेल्वे न दिसल्यामुळे रेल्वे खाली येऊन एक परिक्रमा वासी 'खतम ' झाला अशी अफवा देखील उत्तर तटावर असताना ऐकली होती . 
या गावांमध्ये जाण्यापूर्वी चौकडी नावाचे गाव लागते .इथे रजनीश बिश्नोई नावाच्या एका सद्गृहस्थाने मला आवाज दिला . आणि चहा पिण्यासाठी घरी बोलावले .  अंगणातच त्याने मला बसण्यासाठी आसन दिले . 

नर्मदाभक्त श्री रजनीश बिश्नोई चौकडी खिरकया


बोलता बोलता त्याचे नाव बिश्नोई आहे कळल्यावर मी त्याला सांगितले की परिक्रमे मध्ये मला अमरकंटकच्या अलीकडे ब्रिजेश बिश्नोई नावाचा एक परिक्रमावासी भेटला होता . तो नेमका याचा चांगला मित्र व लांबचा नातेवाईकच निघाला . रजनीशने लगेचच ब्रिजेश ला फोन लावला . मी तिथे आलो आहे हे कळल्याबरोबर ब्रिजेशने मला सांगितले की आता मी पुढे जायचे नाही तो मला भेटायला येतो आहे . कारण त्याचे गाव इथून जवळच होते . ब्रिजेश बिश्नोई याने त्याचे गाव हारदा आहे इतकेच मला सांगितले होते परंतु बाकीची माहिती त्याने सांगितली नव्हती . याच्या गावाचे नाव सालाबेडी असे होते . महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर अमरावती नजीक सालबर्डी नावाचे एक गाव आहे . मला अशा एकसमान गावाच्या नावांची फार मजा वाटते . असो . थोड्याच वेळात खरोखरच ब्रिजेश आला . याने आल्या आल्या मला नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली ! त्याला मला भेटून आतोनात आनंद झाला होता . आता इथून असाच घरी चल म्हणून तो माझ्या मागे लागला .परंतु परिक्रमेच्या नियमानुसार मैयाला घेऊन उलटे चालायचे नसते . ब्रिजेशच्या स्वतःच्या तीन परिक्रमा झाल्या होत्या . माझी ही पहिलीच परिक्रमा सुरू होती . कधी पूर्ण होईल किंबहुना पूर्ण होईल का नाही ते देखील मला माहिती नव्हते . त्यामुळे तो सांगेल ते ऐकणे मला भाग होते . त्याने सांगितले की परिक्रमेचा नियम असा आहे की नर्मदा मातेची कुपी एखाद्या ठिकाणी स्थानापन्न करून तुम्ही आजूबाजूला फिरू शकता तिथे तुम्हाला परिक्रमेचे नियम लागू होत नाहीत . परंतु जिथे मैय्या ठेवली आहे तिथपासून पुढे पुन्हा तिला घेऊन मात्र तुम्हाला चालावेच लागते . त्याने मला सांगितले की तुझे सर्व सामान आणि नर्मदा माता इथे रजनीशच्या घरी देवघरामध्ये ठेव . त्याला कोणीही हात लावणार नाही व ते सर्व साहित्य सुरक्षित राहील . आपण पटकन माझ्या घरी जाऊन परत येऊ . त्याप्रमाणे मैयाची क्षमा मागून तिला रजनीश बिश्नोई च्या देवघरात स्थापन करून ब्रिजेश सोबत निघालो . आता तुम्ही म्हणाल की इतके काय महत्त्वाचे काम लागले होते यासाठी मला जावे लागले ? तर ब्रिजेशने शंभू आणि भोला नावाचे दोन नवीन अश्व घेतले होते . ते दाखवण्याकरता तो मला घेऊन जात होता . हे दोन्ही अश्व अजून त्यांच्या घरी फारसे रुळलेले नसल्यामुळे सांभाळताना थोडा त्रास देत होते . ब्रिजेशला माझ्याकडून उत्तर हवे होते की हे अश्व ठेवावेत की विकावेत . त्यासाठी ते मला दाखवणे आवश्यक होते . हा विषय त्याने मागे आम्ही त्याची परिक्रमा चालू असताना भेटलो होतो तेव्हा देखील सांगितला होता . हा तोच गट होता जे सहा जण , सोबत आणलेल्या एका पंडित जी च्या गाडीवर सर्व सामान लादून स्वतः रिकामे चालत असत . त्यामुळे यांच्या पायांना जबरदस्त गती होती . जोगी टिकरिया या गावापासून आम्ही विलग झालो होतो . इथे मी रस्त्यावर चालताना ब्रिजेश बिश्नोई याने माझा एक व्हिडिओ सुद्धा घेतला होता . त्याचा दुवा आपल्यासाठी टाकत आहे .


यात प्रस्तुत लेखकाची जी चाल दिसते आहे त्याच्यापेक्षा बरोबर दुप्पट वेगाने बिश्नोई कुटुंबीय चालत असत . त्यांच्यापैकी ब्रिजेश सर्वात उंच होता . तसेच तो शालेय जीवनापासून खेळाडू राहिला होता . त्यामुळे त्याची चाल अधिकच वेगवान असायची . असो .
घरी गेल्याबरोबर त्याने त्याचे दोन्ही अश्व मला दाखविले . याचा मोठा भाऊ आणि वडील देखील घोड्यांचे शौकीन होते . ते देखील आले . हे दोन्ही घोडे चावणारे किंवा चिडके आहेत असे त्याचे म्हणणे होते . परंतु मला मात्र त्या घोड्यांनी अतिशय प्रेम दिले . ते दोन्ही अश्व माझ्याशी प्रेमाने का वागत आहेत हे मी शास्त्रशुद्ध पद्धतीने या तिघांना सांगितले . दोन्ही घोडे फारच सुंदर होते . विकण्याचा प्रश्नच नव्हता . याच्याकडे एकूण तीन घोडे ,याच्या मामाकडे पाच घोडे आणि यांच्या शेजारील गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन तीन , दोन तीन घोडे होते . निमगाव ,सालाबेडी , जांभळी ,चौकडी ,खिडकीया , गोयत ही सर्व गावे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहेत असे मला ब्रिजेशने सांगितले . यातील गोयत गावातील जाट -बिश्नोई वादाचा मजेदार किस्सा मी तुम्हाला राणी घोडीच्या प्रकरणात सांगितलाच आहे . जाती व्यवस्था ही आपल्या देशापुढची समस्या नसून जातीभेदाचे पालन करणे ही खरी समस्या आहे . असो . यातील एक घोडा मालकांना फारसा प्रतिसाद देत नव्हता . मी साधारण दीड दोन तास त्यांच्या घरातील मोकळ्या अंगणामध्ये घोड्याला प्रशिक्षण दिले . बोलावल्यावर मालकाकडे जाणे ,थांब म्हटल्यावर थांबणे , चल म्हणल्यावर चालणे , लगाम न धरता मालकाच्या मागोमाग चालणे , नमस्कार करणे अशा बऱ्याच गोष्टी मी बघता बघता त्या सुरेख अश्वाला शिकविल्या . ब्रिजेशचे वडील आणि वडील बंधू हे सर्व बारकाईने आणि कौतुकाने पहात होते . त्यावेळी ब्रिजेश ने काढलेले काही फोटो आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 
ब्रिजेश बिश्नोई सोबत प्रस्तुत लेखक त्याच्या घरी . ब्रिजेश अतिशय हुशार , नम्र , तेजस्वी , सहृदय ,धडपड्या व धडाडीचा तरुण होता . अन्य अनेक स्थानिक परिक्रमावास्यांनी मला घरी बोलवले होते . परंतु मी कोणाच्या घरी गेलो नव्हतो .
शंभू अश्वाची पाहणी करताना प्रस्तुत लेखक
नवीन आश्वापुढे जाताना अचानक त्याला हात लावायचा प्रयत्न करू नये नाहीतर तो चावा घेतो किंवा लाथ घालतो . हळूहळू त्याच्या अंतःकरणाचा ठाव आपल्याला घ्यायचा आहे .
घोड्याला हळूहळू आपलंस करता येतं
शंभू ची उंची चांगली होती
हळूहळू शंभू अश्वाने माझे सह अस्तित्व स्वीकारले
हे सर्व प्रकार करताना शंभू घोडा डोके मारायचा किंवा पाय मारायचा परंतु मला मात्र त्याने सर्व काही शांतपणे करू दिले . 
शंभू माझा अंदाज घेत होता .अजूनही त्याची मान ताठ होती .आणि कान टवकारलेले होते . हे सर्व करताना अतिशय सावध राहावे लागते .कुठल्याही क्षणी तुम्हाला पळून जाता येईल अशी जागा आधीच हेरून ठेवायची असते . 
अखेरीस शंभूला कळाले की हा आपला मित्र आहे .
आणि तो प्रेमाने खाली झुकला
शंभूचा खांदा आणि माझा खांदा पहा म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्या अंगात काय ताकद आहे
ब्रिजेश साठी ही बातमी आनंदाची होती
वरील तीनही फोटो नीट पहा .घोड्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये एक भवरा असतो . माझी स्थिती न हलवता मी आधी त्या भवऱ्याच्या खाली ,मग भोवऱ्यावर आणि नंतर भवऱ्याच्या वर चुंबन घेतले आहे याचा अर्थ तितका घोडा खाली झुकतो आहे .
हाच तो क्षण असतो जेव्हा घोड्याला मोकळे सोडायचे असते . त्याला मोकळे सोडल्याबरोबर घोडा माझ्या मागोमाग लहान बाळासारखा चालू लागला . यापूर्वी त्याला मोकळे सोडले की तो संपूर्ण वाड्यामध्ये फिरून गोंधळ  घालायचा. वाडा खूप मोठा होता . वाड्यामध्ये अजून घोडे आणि गाई म्हशी गुरे होती .यांचे एकत्र कुटुंब होते . असा मस्ती करणारा घोडा इतर प्राण्यांना लाथा मारत सुटतो . अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांसाठी पण हे धोकादायक होते . मी हळूहळू त्याला संपूर्ण अंगण फिरवून आणले . मी त्याला अजिबात धरले नव्हते तो माझ्यामागे शेपटासारखा चालत होता . आता मी ब्रिजेशच्या बाबांना बाहेर बोलवले आणि त्यांना कडकडून मिठी मारली . खूप वेळ त्यांना मिठी मध्ये धरले . त्यांना हळूच कानात सांगितले की हलू नका तुम्ही सुद्धा माझ्या पाठीवरून हात फिरवा .शंभूला कळले पाहिजे की आपण दोघे मित्र आहोत .  आणि मग बाबांना सांगितले की तुम्ही आता चालायला लागा . शंभुने माझ्याकडे पाहिले मी त्याला हाताने जा अशी खूण केल्याबरोबर तो बाबांच्या मागे चालू लागला . संपूर्ण वाडा बाबा फिरून आले आणि त्यांच्या मागे शंभू चालत राहिला . हा प्रकार पाहून त्यांना अतिशय आनंद झाला ! याच गुणी घोड्याला ते विकायला निघाले होते . प्राणी चांगले किंवा वाईट नसतात . आपण त्यांच्याशी कसे वागतो त्यानुसार त्यांचे वागणे बदलते . माणसांची तऱ्हा तरी काय दुसरी आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात पेरीले ते उगवते । बोलण्यासारखे उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावे ते ।काये निमित्ये ।।
घोड्याची सतत चाबूक फटके आणि आरडाओरडा या स्वरूपात संवाद साधला तर तो तुम्हाला लाथाच घालणार . नशीब या प्राण्यांना माणसासारखी शत्रुत्वाची टिकाऊ स्मृति नसते . तिथून आम्ही आमचा मोर्चा भोला कडे वळवला . हा तर नुसता नावाचा भोला आहे . पक्का डँबीस आहे ब्रिजेश मला सांगू लागला .
 भोला हा अतिशय सुंदर घोडा होता
सुरुवातीला तो देखील शंभू सारखाच मला भाव देत नव्हता
हळूहळू त्याची देखील मी शाळा घेतली
प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा असतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक अश्वाचा देखील वेगळा स्वभाव असतो आणि प्रत्येकाला हाताळताना वेगळी वेगळी पद्धत अवलंबावी लागते .
 भोलाची उंची देखील चांगली होती
हळूहळू त्या द्वाड भोलाला देखील मी माझ्या टप्प्यामध्ये आणला . 
त्याच्याकडे माझे लक्ष नाही असे दाखवत मी त्याला व्यवस्थित हाताळत राहिलो . पहिल्याच भेटीत नवीन माणसाला घोडा इतक्याजवळ कधीच येऊ देत नाही . त्यासाठी अश्व मानसशास्त्राचा अभ्यास आणि खूप घोडे हाताळण्याचा सराव याशिवाय दुसरा सोपा मार्गच नाही .
मस्ती करतो , डोके मारतो म्हणून भोलाला गळ्याला पट्टा बांधून ठेवलेले आहे पहा . त्या बंधनाच्या जवळ राहणे हे त्याच्यासाठी सुखाचे आहे . म्हणजे तो त्याचा कंफर्ट झोन आहे . शरण आलेला अश्व त्याचा कम्फर्ट झोन सोडून तुमच्या मागे यायला बघतो .सोबतच्या चित्रांचे निरीक्षण केल्यावर तुमच्या ते लक्षात येईल .
अश्व पूर्णपणे शरण येत नाही तोपर्यंत मी माझ्या पायाचे चवडे देखील त्याच्याकडे वळवलेले नाहीत .
हे सर्व मुद्दाम तपशीलवार बारकाईने सांगतो आहे याचे कारण तुम्हाला लक्षात यावे की हे किती गहन शास्त्र आहे . 
अर्थात आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे असेच आहे . तुम्ही जितक्या खोलात जाऊन अभ्यास कराल तितके ते शास्त्र तुम्हाला अधिक उलगडत जाते . आणि खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुमच्या लक्षात येते की अशी अनेक खोलवर गेलेली शास्त्रे कुठे ना कुठे एकमेकांना पूरक ठरतात . म्हणजे उदाहरणार्थ अश्व मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असलेला मनुष्य हा बाल मानसशास्त्रज्ञ देखील असू शकतो . कारण लहान मुलांची मानसिकता आणि घोड्याची मानसिकता यात खूप साम्य आहे . जेव्हा भोला किंवा शंभू अंगणात पळून उड्या मारायचे तेव्हा सर्वांना दहशत बसायची . परंतु ते दहशत माजवण्यासाठी पळत नसून लहान मुले जशी आनंदाने बागडतात त्यातला त्यांचा तो प्रकार असायचा . त्यांना रोज तो करू द्यावा असे मी सुचवले . त्यासाठी शेतामध्ये एखादे गोल पिट बनवावे अशी सूचना देखील केली . ओघानेच शेतात जाण्याचा विषय आला . ब्रिजेशच्या बंधूंची खूप इच्छा होती की मी शंभूला रेवाल नावाची घोड्याची एक चाल आहे ती व्यवस्थित शिकवावी . शेवटी घर ते शेत आणि शेत ते घर असे काही काळ मी शंभूला सुंदर रपेट करवली . माझ्यासोबत आत्ता मैय्याची शिशी अर्थात बाटली नसल्यामुळे हे करता येणे शक्य होते आणि शास्त्र संमत होते . शंभू आणि भोला हे फक्त ब्रिजेशच्या भावाचे ऐकायचे बाकी कोणाला ते दाद लागू देत नव्हते . मी अजूनही काही मौलिक सूचना या तिघांना केल्या . गोल पीट बनवण्याची जागा निश्चित केली . परिक्रमा संपली रे संपली की मी इथे येऊन कितीही दिवस राहावे आणि सर्व अश्वांना प्रशिक्षित करावे . मामांचे पाच अश्व देखील इकडे मागवून घेऊ . असे ब्रिजेशने मला सांगितले . दरम्यान शेतात येण्यापूर्वी घरी गरमागरम तुपाचा भडिमार असलेले अप्रतिम जेवण आग्रहपूर्वक त्यांनी मला खाऊ घातले होते . इतका आग्रह फार क्वचित पाहायला मिळतो . क्षमतेच्या वर भोजन केल्यानंतर मध्ये पुरेसा वेळ जाऊ न देता घोडेस्वारी केल्यामुळे माझ्या पोटाचे काय होणार याची मला कल्पना आलेली होतीच . कारण घोडेस्वारी हा पूर्णपणे पोटाचा खेळ आहे . घोडा चालवताना तुमच्या पोटाची जितकी हालचाल होते तेवढी अन्य कुठल्याही अवयवाची होत नाही . एखादा झेंडा फडकावा त्याप्रमाणे तुमच्या पाठीचा मणका फडकत असतो . त्यामुळे होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवूनच हे सर्व केले होते . आज सुमारे सतरा अठरा किलोमीटर चालणे आणि ही घोडेस्वारी झाली होती . ब्रिजेशने पुन्हा नक्की या असे आग्रहाचे आमंत्रण देऊन मला चौकडीमध्ये आणून सोडले . आता रजनीशची पाळी होती ! तो ब्रिजेशचाच भाऊ ! त्याने देखील मला अतिशय आग्रह करून सुग्रास भोजन अक्षरशः आकंठ जेवू घातले ! 
 रजनीश बिश्नोई सोबत प्रस्तुत लेखक चौकडी गावी
या प्रेमाच्या अतिरेकाचा काय परिणाम होणार याची मला पुरेपूर कल्पना होती . रोज घोडेस्वारी करणाऱ्या माणसाला काही होत नाही .परंतु खूप दिवसांनी अचानक घोड्यावर बसले की पोटातील सर्व मळ फेकून देण्याची रचना कार्यरत होते . त्यात परिक्रमेमुळे मला भोजनाची शाश्वती आणि निश्चित वेळ राहिलेली नसल्यामुळे शरीराने एक ठराविक प्रमाणात मल कायम साठवून ठेवण्याची प्रवृत्ती धारण केली होती . तो रिझर्व स्टॉक आज ढवळून निघाला होता . त्यात ही दोन प्रमाणाबाहेर झालेली भोजने ! त्यामुळे उलटी किंवा जुलाब यातील एका मार्गाने सर्व बाहेर फेकणे शरीरासाठी क्रमाप्राप्त होते . आणि तेच झाले . न भूतो न भविष्यती असे जुलाब मला सुरू झाले ! नशिबाने मी नर्मदेच्या काठाने चालत नव्हतो . परिक्रमेचे सर्व नियम पाळताना तुम्हाला काहीही त्रास होत नाही . परंतु फक्त एकदा मैया पासून थोडेसे लांब गेलो की लगेच तिने झटका दाखवला ! पहाटे गरम पाण्याने स्नान केले . आणि खूप दिवसांनी पक्क्या बांधलेल्या संडासामध्ये डोल डोल करताना लक्षात आले की आजचा दिवस अवघड असणार आहे . चहा घेऊन पुढे निघालो .  आजचा दिवस जुलाबांचाच होता . काही ठराविक अंतर गेलो की पोटात गडबड व्हायची आणि एखादी मोकळी मोक्याची आडोशाची जागा ,जिथे भरपूर पाणी आहे , अशी नेमकी शेजारी असायची .  तसेही काल वाटेत एका माणसाने बुंदी खायला दिली होती ती थोडीशी खराब झालेली होती असे मला वाटले . परंतु जुलाब काही थांबायचं नाव घेईनात हे मात्र खरं . संपूर्ण परिक्रमेत प्रथमच हा त्रास मला होत होता . कारण संपूर्ण परिक्रमेत प्रथमच मी मैयाला थोडेसे अंतर दिले होते . या संपूर्ण वाटचालीमध्ये पाच ते सहा वेळा तीव्रतम जुलाब झाले . आज नेमकी वैष्णव एकादशी होती . त्यामुळे वाटेत कोणीही चहापाणी काहीही विचारत नव्हते . कडक उपवास आणि अखंड जुलाब यामुळे अंगातले सारे बळ निघून गेले आणि त्यात नेमके आजच संपूर्ण डांबरी रस्त्याने चालायचे होते .खिरकिया गावाचे रेल्वे फाटक ओलांडले . जबलपूर स्थानकाला येताना इथूनच माझी रेल्वे गेली होती हे मला आठवले . रेल्वेच्या काठाने सुद्धा इच्छा नसताना एक दोन डोलडाल घडल्या . उन्हाचा तीव्र कडाका जाणवत होता . पोटात अन्नाचा कण नव्हता . आणि उरलेसुरले सगळे जुलाबा वाटे निघून गेले होते . आता रेल्वेला समांतर असा एक मातीचा फुफाट्याचा रस्ता लागला होता . अंगातील बळ गेल्यामुळे एका सरळ रेषेत चालणे देखील मला अवघड झाले होते . मी मागे वळून माझी मातीत उठलेली पावले बघायचो तर ती एखाद्या दारुड्या सारखी आडवी-तिडवी उठलेली असायची . आता एक नवीनच प्रकार सुरू झाला . अचानक माझ्या जठरामध्ये ,आतड्यामध्ये आग लागली आहे असे वाटू लागले इतकी आग होऊ लागली . असे मला यापूर्वी कधी झाले नव्हते . पोटात भडकलेली ती आग वेदनादायक होती . डोक्यावर सूर्य आग ओकत होता . वेगाने चालत पुढचे गाव गाठावे किंवा एखादा आश्रम गाठावा आणि तिथे पडून राहावे असे ठरवून मी वेग वाढवू लागलो . परंतु पायातले संपूर्ण बळच निघून गेले होते . कालच एखाद्या शूरवीरा सारखा घोडेस्वारी करणारा मी आणि आज स्वतःच्या पायावर धड चालताही न येणारा मी ,ही माझी एकाच दिवसात झालेली अवस्था पाहून माझी मलाच दया आली . माझ्याकडे बिस्किटांचा पुडा होता .माझे एक मन मला सांगू लागले की जाऊ दे एकादशी वगैरे . ती बिस्किटे खा , म्हणजे पोटाला बरे वाटेल . बिस्किटांचा पुडा हातात घेतला . परंतु तेवढ्यात माझा निग्रह अजून पक्का झाला . मी विचार केला की देव आपली परीक्षा बघतो आहे . सर्व काही सुरळीत असताना नियम कोणीही पाळेल . परंतु विपरीत परिस्थितीमध्ये नियम पाळण्याला विशेष महत्त्व आहे . त्यामुळे मी ती बिस्किटे खाल्ली नाहीत . आणि तसाच पाय खरडत चालू लागलो . तसे चालणे फार काही कष्टदायक वाटले नसते .परंतु अखंड जुलाब होत असल्यामुळे शरीरातील सगळे प्राणच निघून गेले होते . त्यात परिक्रमेमध्ये शौचसंमार्जन किंवा लघुशंका केल्यावर काय काय करून मग नर्मदा मातेची पिशवी पुन्हा धारण करायची याची कडक नियमावली ठरलेली आहे .ती सर्व मी कायम पाळत असे . त्यामुळे स्वच्छ हातपाय धुवून प्रतिकात्मक स्नान करून मगच पुढे जावे लागायचे . आश्चर्य म्हणजे हा रस्ता इतका निर्मनुष्य होता की आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते . आता पोटातील आग तोंडातून बाहेर पडते की काय असे वाटू लागले . मी मनापासून नर्मदा मातेचा धावा केला . नर्मदे हर ! मैया चुकलो ,मला क्षमा कर ! काल तुला एकटीला ठेवून मी ब्रिजेश कडे जायला नको पाहिजे होते . मला माफ कर . पुन्हा अशी चूक करणार नाही . हौसे खातर परमेश्वर अंतरलेला परवडणार नाही . नर्मदे हर !नर्मदे माझी पीडा हर ! 
इतक्यात माझ्या शेजारी एक सायकल येऊन थांबली . सायकल वरचा माणूस उतरला आणि त्याने सायकल मेन स्टैंड वर लावली . याच्या तोंडाला मास्क लावलेला होता . आणि या माणसाचे डोळे अतिशय सुंदर आणि पाणीदार होते . सायकलच्या मागच्या कॅरिअरला याने दोन किटल्या अडकवल्या होत्या . प्रत्येकी दीड ते दोन लिटर ची ती किटली असावी . मला तो म्हणाला , " बाबाजी अपना गिलास निकालो । बढीया मही पाओ ।" नर्मदा खंडामध्ये ताकाला मही म्हणतात . मला थोडासा संकोच वाटला . "आप मही बेचने के लिए ले जा रहे हो ना ? " मी विचारले . "अरे उसकी चिंता आप मत करो । हम ग्वाले है । दूध दही मही मे नहाते है । " "क्या नाम है आपका ? और कहा रहते है ?" उपजत चौकस बुद्धीनुसार मी त्याला प्रश्न केला . "हमरा नाम किसनगोपाल यादव है। वैसे हम इस रास्ते से कभी जाते नही । आज पता नही क्यू लगा इस रास्ते से जाते है ।और आप दिखे । " तोपर्यंत मी ग्लास काढला होता आणि त्याच्यामध्ये याने सुंदर असे दाट घट्ट ताक ओतायला सुरुवात केली . ताकावरती भरपूर लोणी देखील तरंगत होते . " खाओ खाओ ।माखन भी खाओ । इससे आपका पेट भी ठीक हो जायेगा । " ते ताक मी प्यायलो आणि अक्षरशः स्वर्गात पोहोचलो ! इतके सुंदर ताक मी आजवरच्या आयुष्यात प्यायलो नव्हतो ! काय ती चव ! काय तो स्वाद ! अक्षरशः मी अमृत पितो आहे  असा मला भास झाला ! माझे पहिला पेला ताक गटागट पिऊन झाले ! त्या माणसाला खूप आनंद झाला ," और पीओ । जितना जी मर्जी चाहे पीयो ! " असे म्हणत त्याने पुन्हा ताकाचा पेला भरला . लोण्याचा एक मोठा गोळा पेल्यामध्ये पाडत तो म्हणाला , " बचपन मे हम ये माखन चुराके खाते थे । मैया पूछती  । किसने माखन खाया ?
और हम कहते थे । मैने नही खाया ! " मला सुरदासाचे ते भजन आठवले आणि मी लगेच ती ओळ गायलो , " रे मैय्या मोरी , मै नही माखन खायो ! " दोघेही हसायला लागलो . ते अमृता समान लोणी आणि ताक पोटात गेल्यावर पोटाला एकदम थंडावा मिळाला . थंडपणाची ती लहर अगदी मेंदूपर्यंत गेली .त्याने आग्रहाने अजून थोडे ताक ओतले आणि म्हणाला , " मैया को कोई क्या फसाए ? मैय्या है वह । सब जानती है । उसको सब पता रहता है । अपना बेटा किधर क्या कर रहा है ।  "  मी त्याचे मनापासून आभार मानले आणि बिस्कीट चा पुडा त्याला देऊ केला . तो नाकारत यादव म्हणाला , " मेरी एकादशी होती है । " ताकाची चव अजून तोंडातून जात नव्हती . पेल्यामध्ये तळाशी जमा झालेले दोन चार थेंब सुद्धा मी पुन्हा एकदा पिऊन घेतले ! आता पेला आणि पार्ले जी चा पुडा झोळी मध्ये ठेवावा म्हणून मी मागे वळलो आणि दप्तरामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्या . झोळी खांद्यावर घेतली आणि बघतो तो काय ! माझ्या आजूबाजूला समोर कोणीच नाही ! हा इतक्या वेगाने कसा काय निघून गेला असेल ? असा विचार करून मी धुळीने भरलेल्या रस्त्यावर त्याच्या सायकलच्या चाकांच्या खुणा दिसतात का पाहू लागलो . परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर माझी एकट्याची पावले सोडून अजून कुठल्याही खुणा उठलेल्या नव्हत्या. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या . अरे किमान सांगायचेस तरी ! हृदयातून त्याने साद दिली . तुला सांगितले की रे ! तुझ्या लक्षात नाही आले ! आणि खरोखरच माझे पोट दुखते आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हते ! याने पोटासाठी हे चांगले आहे हे कसे काय सांगितले असेल ? सारेच अनाकलनीय होते . परंतु जुलाबाने गळून गेलेले माझे शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने , तरतरीत आणि जणू काही झालेच नव्हते असे निश्चितपणे झाले होते ! तोंडातली ती अमृताची चव अजूनही जात नव्हती ! मी पुन्हा एकदा पेला काढून पाहिला . त्याला ताकाचा जराही अंश चिकटला नव्हता आणि वासही येत नव्हता . एरव्ही ताकाचा वास व ओशटपणा कितीही भांडे घासले तरी जाता जात नाही . हा सर्व प्रकारच अगम्य होता . चालण्यासाठी दहा हत्तीचे बळ आल्यासारखे झाले . थोडे अंतर चालल्याबरोबर एकाने उपवासाचा चिवडा , द्राक्षे आणि केळी आणून दिली . ती न खाता तशीच ठेवून दिली . साक्षात अमृताची चव तोंडात होती .ती मला घालवायची नव्हती . कानामध्ये अखंड त्याचे आश्वासक स्वर घुमत होते , " मैय्या है वह । सब जानती है । "


लेखांक त्रेसष्ठ समाप्त ( क्रमशः )

लेखांक ६४ : रामपुरीचा मुक्काम , अजूनच मोठी तवा नदी आणि चारखेडा-मांडला अरण्य

अमृता सारख्या त्या ताकाची चव मुखामध्ये राखत आज अक्षरशः वेड्यासारखा चालत सुटलो . एका शेतातून काहीतरी हलते आहे असे मला दिसले .लक्षपूर्वक पाहिले असता एक काळवीट उड्या मारत पळताना दिसले . 

थोड्याच वेळात काळवीटांच्या एक कळपच उड्या मारत मारत या शेतातून त्या शेतात पळाला .रस्त्यावरून अक्षरशः काळवीट हवेत उडते आहे की काय असे वाटावे इतक्या उंच उड्या मारत होते . काळवीटे इतकी उंच उडी का मारतात हे अजूनही कळलेले नाही ! सरळ पळता येत असून विनाकारण उंच उड्या मारत पळतात . गवताच्या बाहेर येऊन शत्रू दिसणे हा एक उद्देश आहे परंतु इथे एवढ्या उंचीचे गवतच नाही !

बिश्नोई समाज आणि काळवीट यांचे अतूट नाते आहेत . धर्मामुळे प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे रक्षण होणे अशी संकल्पना असलेला हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे .
( सर्व छायाचित्रे संग्रहित )
 बिश्नोई समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या समाजाचा लोगो वापरला जातो त्यात देखील हरीण आहे . 
अभिनेता सलमान खान ने काळवीटाची शिकार केल्यावर ते प्रकरण बिश्नोई लोकांनी कसे शेवटाला नेले होते हे सर्वांनी पाहिले आहेच . असो .
आता एक मोठा डांबरी मार्ग लागला होता . आणि कित्येक किलोमीटर या रस्त्याने चालण्या शिवाय पर्याय नव्हता . या रस्त्यावरून अतिशय वेगाने जड वाहनांची वाहतूक सुरू होती . परिक्रमावासींसाठी अत्यंत धोकादायक मार्ग ! तरी देखील लोक आजूबाजूला न बघता रस्त्याच्या वरून चालायला पाहत होते . मी वाहतुकीच्या नियमाप्रमाणे विरुद्ध बाजूने आणि रस्त्याच्या बाजूला मोकळ्या सोडलेल्या मार्गीकेतून चालत राहिलो . खडे ,खडी , काचा ,काटे सारेच पायासाठी अत्यंत वेदनादायक होते . त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे प्रदूषण पहिल्यांदाच अनुभवत होतो . धुराने जीव गुदमरत होता . मी असे ठरविले की विक्रमी वेगाने चालत हा घाणेरडा टापू एकदाचा संपवून टाकायचा . हा मध्य प्रदेश मधला राज्य महामार्ग क्रमांक १५ होता . खिरकीया , पोखरणी , धनोरा , दगडखेडी , धारूखेडी , बोथिया खुर्द अशी गावे पार करत रामपुरी पर्यंत आज मला पोहोचायचे होते . नर्मदेचे पाणी उजव्या हातालाच होते परंतु दिसत नव्हते .
जुलाबामुळे पोट रिकामे झाले होते . आणि ताकामुळे नवीन ऊर्जा प्राप्त झाली होती . त्यात उपवास असल्यामुळे बाकीचे काही खाल्ले नव्हते . इतर गाड्या टाकी फुल केल्यावर चांगले ॲव्हरेज / मायलेज  देतात परंतु आपली पायगाडी मात्र टाकी रिकामी गेल्यावर चांगली पळते असा माझा अनुभव आहे . अतिशय सुसाट वेगाने मी चालत होतो . मध्ये काही परिक्रमावासी दिसायचे त्यांना मागे टाकून मी पुढे जायचो . 
अचानक एका झाडावर ओळखीची पिशवी लटकवलेली दिसली . ही सात्यकी रायची पिशवी होती . शेतामध्ये तो एका झाडाखाली झोपलेला दिसला . हा टप्प्याटप्प्याने गाडी वर बसून प्रवास करत होता . त्याला न जागे करता मी पुढे गेलो .परंतु भरपूर चालल्यामुळे पाय खूप गरम झाले होते . इतक्यात एका उसाच्या शेताला पाणी सोडलेले दिसले त्या पाण्यामध्ये पाय सोडून पाटाच्या काठावर बसून राहिलो . पायामधील सर्व थकवा क्षणात निघून गेला . पाणी पिऊन पाहिले असता मैयाची चव लागली . याचा अर्थ मैय्या इथून खूपच जवळ असणार होती ! नुसते तिचे स्मरण केल्यावर अंगात शक्ती आली आणि उठून पुढे चालायला लागलो ! महामार्गावर जाणारे गाडीवान दादा तुम्हाला गाडी बाजूला घेऊन विचारतात की कुठे सोडायचे आहे का वगैरे . काही परिक्रमावासी या प्रलोभनाला बळी पडतात . परंतु मी कधीच बळी पडलो नाही . ज्यांना मुळात परिक्रमा उरकायची असते ते असे शॉर्टकट नक्कीच स्वीकारतात . मला तसली काही घाई नव्हती . जे करण्यासाठी आलो ते व्यवस्थितच केले पाहिजे . मी तर म्हणतो नर्मदा परिक्रमेला येऊन घराच्या आठवणी काढण्यापेक्षा घरात बसून नर्मदेची आठवण काढलेली कधीही श्रेष्ठ आहे ! काही करून तुमचे मन तिच्या चरणाशी लागले पाहिजे बास ! आता सुद्धा पाटाच्या पाण्याने ते काम केले होते ! मी कुठेही गेलेली नाही तुझ्या सोबतच आहे हा आश्वासक संदेश घेऊन ते पाटाचे पाणी माझ्यापर्यंत आले होते ! इथे मध्ये एका दुकानदाराने आवाज दिला आणि शीतपेय प्यायला बोलावले . या ठिकाणी एक सायकल वरून चाललेला परिक्रमा वासी भेटला . त्याला थांबवले आणि माझ्या ऐवजी हे पेय त्याला द्या असे दुकानदाराला सांगितले . मला आज काहीही खायचे नव्हते . या माणसाचे नाव दयानंद स्वामी असे होते . पाणीदार डोळे होते . भाग्यनगर (हैदराबाद ) इथून निघालेला हा इसम सायकल वरती संपूर्ण भारतभ्रमण करत होता . ज्यात प्रामुख्याने चारधाम , बारा ज्योतिर्लिंगे , १०८ दिव्य दैसम , सप्तपुरी असे सर्व नियोजित होते . त्यातलाच एक टप्पा म्हणून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तो आला होता .नर्मदा परिक्रमा मार्गाच्या आसपास पाच ज्योतिर्लिंगे आहेत असे तो म्हणाला . त्याच्या फोनवर त्याने आमचा एक सेल्फी काढला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
सायकलवर भारत तिर्थाटणाला निघालेले भाग्यनगर येथील तेजस्वी साधू दयानंद स्वामी .
याला तेलुगु सोडून अन्य कुठलीही भाषा येत नव्हती .तरी देखील भारत भ्रमण शक्य आहे हे ह्याने सिद्ध करून दाखवले .कारण भारतामध्ये आजही माणसाची भाषा , भूषा न बघता भावमात्र बघितला जातो .
आज पायांना गती आली होती ती जाऊ नये म्हणून मी फारसा थांबत नव्हतो . एकदा चालता चालता तुम्ही थांबलात की पायातले गतीने चालू असलेले रक्ताभिसरण विस्कळीत होते . आणि मग सगळी गडबड होते . आज संध्याकाळ झाली तरी काही केल्या मुक्कामाचे कुठले ठिकाणच सापडेना . राज्य महामार्ग असल्यामुळे आजूबाजूला फारशी वस्ती सुद्धा नव्हती . छोट्या मोठ्या नद्या तेवढ्या पार करत होतो . अखेरीस अंधार पडू लागल्यावर अमरावतीच्या बाबाने चालविलेला एक आश्रम लागला . हे गाव होते रामपुरी . बाबांच्या कानपूर लाईन मध्ये गडबड होती . अर्थात हे माझे वाक्य नाही हे ते स्वतः सगळ्यांना सांगत होते ! कानपूर लाईन मध्ये गडबड आहे याचा अर्थ कानाने ऐकायला येत नाही . बहिरे असले तरी बाबा अतिशय बोलके होते .यांचा स्वभाव अतिशय मोकळा , निर्मळ तितकाच बोलका होता . यांचे नाव बाबा मंगलनाथ जी महाराज . गावकऱ्यांनी एका सामायिक जागेमध्ये यांना दोन खोल्या आणि पडवी बांधून आश्रम काढून दिला होता . माझ्या आधी बरेच परिक्रमावासी येऊन इथे उतरलेले दिसले . 
त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिलेले लोक म्हणजे सौ . रंजना विकासराव पाटील या मूळ जळगावच्या माताराम . त्यांचा निवास सध्या पुनावळे येथे होता . त्यांची पायी परिक्रमा आता संपत आली होती .त्यामुळे त्यांना शेवटचे काही दिवस सोबत देण्यासाठी त्यांचे पती विकासराव पाटील साहेब हे स्वतः आले होते . हे स्वतः एका सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते .वेळात वेळ काढून ते आले होते . पत्नीला अशी खंबीर आणि सक्रीय साथ देणारी माणसे फार कमी पाहिली . त्या मातरम देखील इतक्या बाणेदार की स्वतःचे थोडे देखील सामान साहेबांच्या पाठीवर देत नव्हत्या. धन्य ती जोडी ! तानाजीराव पडवळ नावाचे मुपो धानोरे तालुका येवला जिल्हा नाशिक इथले एक परिक्रमा वासी होते . हे डोक्यावर पनामा हॅट घालून चालायचे त्यामुळे माझ्या चांगले लक्षात राहिले ! स्वभावाने एकदम दिलखुलास व आनंदी होते . पाटील दांपत्य आणि तिथे जमलेले सगळे परिक्रमावासी यांच्यासोबत छान गप्पा झाल्या . सुदैवाने परिक्रमे मध्ये असताना परिक्रमेतले अनुभव कोणी एकमेकांना फारसे सांगत बसत नाही . सर्वांना आता पुढे काय याची चिंता अधिक असते . मग एखादा जरी पूर्वी त्या मार्गाने गेलेला परिक्रमावासी भेटला की त्याच्याभोवती सर्वांचा गराडा जमा होतो ! मग त्या परिक्रमावासी ला कोण भाव प्राप्त होतो ! विशेषतः साधू लोक सतत परिक्रमा करत असतात . त्यामुळे त्यांना लोक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात . तुम्ही कुठला प्रश्न विचारता यावरून तुम्ही 'मुरलेले ' परिक्रमावासी आहात की नवीन आहात हे लगेच कळते . इथे बाहेर अंगणामध्ये एक पार होता डावीकडे बोरवेल ची नळी काढून ठेवली होती . लागेल तेव्हा मोटर चालू करून गरम पाणी उपलब्ध व्हायचे . मंगलनाथ जी महाराजांनी सर्वांना आग्रहाने सुंदर असे जेवण वाढले . अंगणातच पंगती बसल्या . स्थानिक ग्रामस्थ बाबाच्या मदतीला यायचे . सगळीकडे थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसते . आपला नोकरी धंदा किंवा शेतीची कामे आटोपून रात्री मदतीसाठी काही ग्रामस्थ येतात . 
आश्रमासमोरील पाटी
 आश्रमाचे प्रवेशद्वार
 आश्रमातील परिक्रमावासी निवास
 शिवमंदीर
 अंगणात बसलेल्या भोजनाच्या पंक्ती
पहाटे मोटर चालू करून मस्त गरम पाण्याने अंघोळ केली .गरम पाणी म्हणजे आपण घरी वापरतो तसे गरम नव्हे . फक्त ते रात्रभर साचलेल्या गार पाण्यापेक्षा कमी गार असते म्हणून त्याला गरम म्हणायचे ! इतकेच ! आज लवकर निघालो . आजवरचे विक्रमी अंतर मी चाललो . दिवस संपेपर्यंत साधारण ४८ किलोमीटर भरले होते . जिथे मैया समोर दिसत नाही तिथे आपोआप माझी गती वाढायची . वाटेमध्ये भेटलेल्या सर्व लोकांनी मला सिंगाजी महाराजांची समाधी जमल्यास अवश्य पहा असे सांगितले होते . ही समाधी तशी एका बाजूला धरणाच्या एका काठावरील शाखेच्या मधोमध होती त्यामुळे शक्यतो तिकडे कोणी जात नसे . परंतु मला आतून खूप आकर्षण वाटत होते म्हणून मी गेलो . तसे पाहायला गेले तर महाशिवरात्र तीन दिवसावर येऊन ठेपली होती . आणि मी पायांना थोडीशी अधिक गती दिली असती तर ऐन महाशिवरात्रीला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला पोहोचणे मला शक्य होते . मी सरासरी वीज बावीस किलोमीटर चालत असलो तरी अजून थोडासा ताण देऊन ३५ ते ४० किलोमीटर रोज चाललो असतो तर ११० / १२० किलोमीटर अंतर सहज पार केले असते . अलीकडच्या काळात परिक्रमेची जी गती वाढलेली आहे त्या गतीचा विचार केल्यास देव दिवाळीला जे लोक परिक्रमा उचलतात त्यांची परिक्रमा बरोबर महाशिवरात्रीच्या आसपास ओंकारेश्वर येथे समाप्त होते . त्यामुळे आता बरेचसे परिक्रमा वासी , जे मला मुक्कामांवर भेटत होते , त्या सर्वांची परिक्रमा संपत आलेली होती . मी एकमेव असा अध्ये मध्ये परिक्रमा चालू केलेला मनुष्य होतो . सिंगाजी बाबा समाधीकडे जाण्यासाठी डांबरी सडकेने जायचे असेल तर फारच लांबचा रस्ता होता . परंतु इथे अतिशय निबिड अरण्यातून जाणारा एक जबरदस्त शॉर्टकट देखील होता . इथे एकच अडचण होती . जंगलामध्ये अनेक रस्ते असल्यामुळे माहितगार मनुष्य सोबत असल्याशिवाय त्या रस्त्याने जाता येणे अशक्य होते . त्यामुळे या भागात कोणी देखील परिक्रमावासींना या शॉर्टकट बद्दल सांगत नसे . कधी कधी चौकस बुद्धी कामाला येते ती अशी . मला भेटणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांशी गप्पा मारताना मी आवर्जून काही शॉर्टकट वगैरे आहेत का वगैरे विचारून घेतसे . " कोणाला सांगू नका . तुम्हाला म्हणून सांगतो . " वगैरे पद्धतीने मग असे शॉर्टकट मला कळून जायचे . इथून मी एकटाच झपाझप चालत एका नदीपाशी आलो . या नदीचे नाव देखील तवा असेच आहे . परंतु आधी पाहिलेली तवा नदी हेचे पिल्लू वाटावे इतके मोठे पात्र या नदीने धारण केलेले होते ! प्रत्यक्षात धरणाचे पाणी उलटे शिरल्यामुळे ही नदी जणूकाही एखाद्या समुद्रासारखी भासत होती . इथून पुढचा मार्ग मी अतिशय नीट समजून घेतला होता . रामपुरी सडियापाणी , छनेरा किंवा नया हरसुद , चारखेडा ,तवा ,शेजला ,मांडला ,करोली ,सोनगाव , गहलेगाव व सिंगाजी समाधी . आता पुन्हा फिरून गुगलवर जेव्हा मी हे सारे मार्ग बघतो तेव्हा मला आश्चर्य वाटते . कारण स्थानिक लोकांशी बोलून माझ्या डोक्यामध्ये जो एक नकाशा तयार व्हायचा तो वास्तवातील नकाशाशी बऱ्यापैकी जुळणाराच आहे . कुठलाही नकाशा नसताना लोकांनी हे शॉर्टकट मार्ग कसे शोधून काढले असतील ! तारखेडा गावामध्ये सिंगाजी बाबा यांचे गुरु मनरंगी गिरी स्वामी यांची समाधी होती . हरसुद नावाचे गाव पुरामध्ये बुडाल्यामुळे छनेरा या गावांमध्ये त्याचे पुनर्वसन झाले होते .हे गाव बऱ्यापैकी मोठे होते . छोटे शहरच म्हणा ना ! त्यामुळे लोक याला नया हरसूद म्हणायचे . पुढे तवा नदीच्या काठावर एक फुलपाखरू उद्यान साकारले होते . आकर्षक प्रवेशद्वार आणि आत मध्ये केलेल्या हरितगृहामध्ये फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती लावल्या होत्या . नर्मदे हर हर या पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचा मुलगा कृष्णमेघ कुंटे याने लहानपणी मला फुलपाखरे कशी वाढवता येतात हे प्रात्यक्षिका सह शिकवले होते . मी त्याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे वीस एक फुलपाखरे घरी तयार केली होती ! तयार करायची म्हणजे काय तर फुलपाखरू ज्या झाडावर अंडी घालते ती अंडी घरी नेऊन एका बरणीत ठेवून द्यायची आणि त्यातून आळ्या बाहेर आल्या की रोज त्या झाडाची ताजी ताजी पाने आणून त्या आळीला खायला घालायची . अळीचे पुरेसे खाऊन झाले किती कोश तयार करते या कोशाचे नीट संरक्षण करायचे . आणि त्यातून फुलपाखरू बाहेर आले की ते सोडून द्यायचे . निसर्गामध्ये सुद्धा हे होतेच परंतु बरेचदा फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी झाडे शिल्लक न राहिल्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा मानवी वावर असलेल्या ठिकाणी फुलपाखरे अंडी घालू लागली आहेत .अशी झाडे अनेकदा माणसाकडून अनवधानाने तुटतात किंवा मुंग्या ,किडे ,पक्षी यांचे लक्ष  जाऊन आळ्या फुलपाखरू होण्यापूर्वीच त्यांच्या भक्ष्य स्थानी पडतात . प्रत्येक फुलपाखराचे ठरलेले झाड असते त्यावरच ते अंडी घालते . एक मादी अनेक अंडी घालते व शक्यतो पानाच्या खालच्या बाजूला तिळाप्रमाणे दिसणारी छोटी अंडी चिकटलेली आढळतात . यातून आळी बाहेर आल्यावर प्रत्येक फुलपाखराच्या प्रजातीनुसार त्यांचा पाने खाण्याचा कालावधी वेगळा वेगळा असतो तसेच प्रत्येक अळीचा सर्वात मोठा आकार देखील वेगवेगळा असतो .अंडे फुटून , आळी बाहेर येऊन ,इवलीशी आळी लहानाची मोठी होऊन ,तिचे फुलपाखरू होताना पाहणे , व त्याला पुन्हा निसर्गात मुक्त करणे , ही खूप मनोरंजक व आनंददायक प्रक्रिया असते .असो .
त्यामुळे मी हे फुलपाखरू उद्यान आत जाऊन पाहण्याची तसदी घेतली नाही . परंतु ज्यांना आवड आहे त्यांनी अवश्य पहावे . 
तवा नदीच्या काठावरील फुलपाखरू उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार .मागे तवा नदी दिसते आहे .
फुलपाखरू उद्यानाचा अंतर्भाग
तवा नदीच्या विस्तीर्ण पात्रावरून जाणारा हरसूद मुंदी पूल .आपल्याला हा पूल पार करायचा आहे .

हा नकाशा पाहिल्यावर तुम्हाला या संपूर्ण भागाचा भूगोल लक्षात येईल . नकाशाच्या अगदी खाली बटरफ्लाय पार्क दिसते आहे . इथून छोटासा पूल दिसतो आहे त्यावरून आपण तवा नदी ओलांडणार आहोत . डावीकडे एक पूल दिसतो आहे तो रेल्वेचा आहे .आता एकदम वरती या आणि पाण्यामध्ये असलेली सिंगाजी महाराजांची समाधी बघा . इथपर्यंत जाण्यासाठी चारखेडा मंडला जंगल आपल्याला पार करायचे आहे . मध्ये असंख्य ओढे नाले नर्मदेला येऊन मिळत आहेत . त्यामुळे मार्ग फसवा कठीण आणि श्वापदांचे भय असलेला देखील आहे .
हा पुलच सुमारे एक किलोमीटर लांबीचा आहे . याच्यावरून आपल्याला किती चालायचे आहे त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता !
तवा नदीच्या जलाशयामध्ये विहार करणारी एक नौका .यावरून तुम्हाला जलाशय किती विस्तीर्ण आहे याचा अंदाज यावा . तवा नदी म्हणण्यापेक्षा नर्मदेचे उलटे शिरलेले पाणीच जास्त आहे .
परंतु खरोखरीच हा रस्ता अतिशय सुंदर आणि स्वर्गीय अनुभव देणारा होता . या रस्त्याने चालताना फारच मजा आली ! अशा जंगलातून एकटे चालण्याची मजा काही औरच असते ! दरम्यान या पुलावर मला काही मराठी परिक्रमा वासी भेटले . संजय माऊली खापरकर नावाचे आळंदीचे एक अतिशय सात्विक परिक्रमावासी होते , ज्यांची ही तिसरी परिक्रमा चालू होती ! त्यांनी मोठ्या प्रेमाने माझी चौकशी केली . त्यांच्यासोबत गणपतराव भावसार म्हणून पिंपळे गुरव पुणे येथे राहणारे एक वयोवृद्ध परिक्रमा वासी होते . परंतु ते चांगले चालत होते . यांच्यासोबत एक मध्यप्रदेश मधीलच दांपत्य चालत होते . या पुलावर भावसार काकांच्या फोनवर मी सेल्फी फोटो काढला आणि तो मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठवण्यात आला . 
चित्रात डावीकडून संजय माऊली खापरकर मध्य प्रदेश मधील दाम्पत्य आणि गणपतराव भावसार पुणे यांचे सोबत प्रस्तुत लेखक .
मागे दूरवर पसरलेला तवासागर . मध्ये तयार झालेल्या तात्पुरत्या बेटावर नावेतून जाऊन शेती केली जात होती . 
ही सर्व माणसे मला याच ठिकाणी का बरं भेटावीत ? याच्यामागे मैय्याचे नियोजन होते .
ऊन किती कडक आहे याचा अंदाज छायाचित्रातून तुम्हाला येईल . रात्रभर प्रचंड थंडी आणि दुपारी कडक ऊन . 
इथूनच सरळ ओंकारेश्वरला जाण्याचा सडक मार्ग होता . हे सर्व लोक आता न थांबता सडक मार्गे थेट ओंकारेश्वर गाठणार होते . कारण महाशिवरात्र आणि परिक्रमेची समाप्ती हा योग कोण बरं सोडेल ! परंतु मला तर सिंगाजी बाबांची समाधी बघायची इच्छा देखील निर्माण झाली होती . या निर्जन रस्त्यावर मी कोणाला विचारावे ? इतक्यात काही क्षणापुरतेच संजय माऊली खापरकर मला भेटले . ते बरोबर अशा ठिकाणी मला भेटले जिथून जंगलातील शॉर्टकट चा मार्ग सुरू होत होता . त्यांच्या पूर्वी तीन परिक्रमा झालेल्या असल्यामुळे त्यांना या सर्व प्रकारांची आणि मार्गाची माहिती होती . त्यांनी मला खात्रीशीरपणे सांगितले की रोज जर मी ४० किलोमीटर पेक्षा अधिक चालायचेच अशी तयारी ठेवली ,तर मी आरामात ओंकारेश्वरला सर्व दर्शने करत करत  येऊ शकतो . गुरु किती महत्त्वाचा असतो हे परिक्रमे मध्ये पदोपदी लक्षात येते . ज्याने आधी तो मार्ग चोखाळला आहे अशा माणसाचे मार्गदर्शन तुम्हाला आश्वस्त करते ! या चौघांना नर्मदे हर करून मी लवकरच जंगलातील मार्ग पकडला ! 
या संपूर्ण भागात बऱ्यापैकी दाट अरण्य होते .गाव सोडले तर बाकी सर्व झाडी असायची .
अरण्य खूपच सुंदर होते . . डावीकडे अरण्यातच हा आश्रम आहे असे लक्षात आले . क्षणभर विसावा घ्यावा म्हणून आत मध्ये गेलो . आत मध्ये बसलेल्या परिक्रमावासींनी तोपर्यंत आवाज दिलेला होताच . आश्रम फारच रम्य होता . आश्रम म्हणजे काय तर पत्र्याची कुटी आणि धुनी प्रदीप्त केलेली! इथे आखाड्याचे काही साधू राहत होते . त्यांनी कोरा चहा पाजला . 
 हाच तो अरण्य आश्रम
 भस्मधारण केलेला , पायात घुंगरू असलेला , डोक्यावर जटाभार असलेला , केवळ लंगोटी नसलेला , धुन्यावर टिक्कड बनवणारा दशनामी आखाड्याचा साधू . हे चित्र याच आश्रमातील परंतु अन्य वेळी अन्य कोणीतरी काढलेले आहे .
असे साधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनसोक्त गांजा ओढला जातो . गृहस्थांनी अशा ठिकाणी शक्यतो जाऊ  नये असे साधूच सांगतात .कारण हे कर्म गृहस्थाश्रमास पूरक नाही . मारक आहे . 
चहा पिल्याने तरतरी आली आणि भरपूर चालायचे आहे याची कल्पना असल्यामुळे अधिक वेळ न थांबता सामान उचलले .अगदी निश्चिंतपणे आणि निर्भयपणे मी त्या वनात घुसलो ! सिंगाजी बाबा , मै आ रहा हु !अशी आरोळी देखील गमतीने ठोकली ! कमी उंचीची खुरटी झाडे होती . झाडी विरळ होती परंतु एकसंध होती . डाव्या हाताला दूरवर शेती दिसत होती . हळूहळू संपूर्ण वनातला मार्ग सुरू झाला . इथे वन्य श्वापदे असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या . त्यांनी इथेच तथा विखुरलेली हाडके ,त्यांची विष्ठा ,केस पाहत पाहत पुढे चालत होतो . इथे गाईंची अतिशय सुंदर पोकळ शिंगे मला सापडली होती . परंतु ओझे नको म्हणून मी ती सोबत घेतली नाहीत . अन्यथा अशा शिंगाला चांदीचे कोंदण करून अभिषेक पात्र अतिशय उत्तम पद्धतीने बनवता येते . काही लोक या शिंगापासून तुतारी देखील बनवितात . साधारण जंगलाच्या मध्यभागी आल्यावर मला माणसांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला . माझ्यापुढे चाललेले तीन परिक्रमावासी एका ठिकाणी मार्ग सुचत नसल्यामुळे थांबले होते . सिहोर या मध्य प्रदेश मधल्या गावातले एक दांपत्य होते आणि काशीच्या मणिकर्णिका घाटावरचा एक तरुण साधू होता . जंगलाच्या मधोमध असलेल्या या चौकामध्ये पाच रस्ते येऊन मिळत होते . आणि कुठल्या मार्गाने जायचे हे या तिघांना कळत नव्हते . सुमारे अर्धा तास ते इथेच बसले होते . पुढे चुकीच्या मार्गाने जाऊन चार-पाच तास भटकण्यापेक्षा अर्धा एक तास थांबलेले परवडते हे अनुभवच तुम्हाला शिकवतो . काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला होता . माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर होते ! नर्मदे हर असा पुकारा मी केला . इतक्यात जंगलातून देखील नर्मदेहर असा आवाज आला ! एक गुराखी दोनच मिनिटांमध्ये तिथे दाखल झाला . त्याने आम्हाला त्याच्या गावातून जाणारा पुढचा मार्ग व्यवस्थित दाखवला .  आम्ही सर्वजण त्याने सांगितलेल्या खानाखोना लक्षात ठेवत मांडला गावात येऊन पोहोचलो .इथे यायचे एकमेव कारण होते ते म्हणजे पुढचा मार्ग गावातील कोणाकडून तरी समजावून घेणे . गाव म्हणजे चार-पाच घरांची विरळ वस्ती होती . इथे बसून पाणी प्यायलो आणि पुढचा मार्ग समजावून घेतला . मध्ये दोन-तीन मोठ्या नद्या आडव्या येणार होत्या . मला एकट्याला चालायचे आहे हे मी काशीच्या साधूला समजावून सांगितले आणि पुढे निघालो . सिहोर चे दांपत्य मला थांबवायचा प्रयत्न करत होते . अखेरीस एका नदीपर्यंत मी त्यांच्यासोबत चाललो . या नदीवर ती खूपच रम्य असा धबधबा होता . इथे हे तिघे रमले . त्यांनी कपडे वगैरे धुवायला काढले . त्या संधीचा फायदा घेऊन मी तिथून पोबारा केला ! हे सर्व तुम्हाला ऐकायला थोडेसे विनोदाचे वाटत असेल  खरे , परंतु कोणी थांब असा आग्रह धरल्यावर तो मोडता येणे आणि तोही अशा जंगलामध्ये , हे फार कठीण काम असते . त्यामुळे अशावेळी गुपचूप सटकलेले अतिउत्तम असते ! नदी मात्र खरोखरच खूप सुंदर होती . मी एकटा असतो तर नक्की तिथे काही काळ थांबलो असतो . आता अचानक शेती सुरू झाली . शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने त्याच्या घराचा पत्ता सांगितला आणि तिथे जाऊन बसा .मी मागून घेतो असे सांगितले . शेतामध्येच बांधलेले सुंदर घर होते . अंगणामध्ये आसन लावून मी बसून राहिलो . आज सकाळपासून पोटात फार काही गेलेले नव्हते . आणि चालणे देखील खूप झाले होते . त्यामुळे इथे बसल्यावर खूप बरे वाटले . थोड्यावेळाने तरुण शेतकरी आला . याचा मोठा भाऊ आणि हा असे दोघेच त्या घरात राहत होते . आई वडील वारले होते आणि दोघांच्या बायका यांना सोडून निघून गेल्या होत्या . सुमारे चाळीस एकर क्षेत्राला कुणीही कायदेशीर वारस हे निर्माण करू शकले नव्हते . गृहलक्ष्मीचा वास घरामध्ये नसल्यामुळे मोठे घर असूनही भकास , उदास वाटत होते . दोघांनाही आपल्या चुकांची आता जाणीव झालेली होती आणि सुधारण्याची तयारी होती . मी थोडा वेळ बसून त्यांच्या सर्व प्रश्नांना यथामती उपाय सुचविले . समुपदेशन असे म्हणा फार तर . आणि त्यांनी दिलेला भोजन प्रसाद ग्रहण करून पुढे निघालो . त्यांच्या जमिनीला कायदेशीर वारस निर्माण होणे आवश्यक होते . चाळीस एकर क्षेत्र मालकीचे असल्यामुळे दुसरे लग्न होण्यास दोघांनाही काहीही अडचण येणार नव्हती . बदल यांना करायचा होता तो होता मशागतीमध्ये . या भागातले लोक मनाने खूप निर्मळ असल्यामुळे अगदी दिलखुलास बोलतात . तुमचा परिचय नाही , वगैरेंची आहे अशी कुठली भूमिका त्याला आडवी येत नाही .
आता मला वेध लागला होता सिंगाजी महाराजांच्या समाधीचा ! एक मोठी नदी आडवी आली . आणि ती पार केल्यावर सिंगाजी महाराजांच्या समाधीचा रस्ता दिसू लागला ! सिंगाजी महाराज हे नर्मदा खंडातील एक अतिशय जागृत प्रकरण आहे ! अंधार होता मी दयाधाम आश्रमात पोहोचलो . ४८ किलोमीटर चालणे झाल्यामुळे आता एकही पाऊल टाकायची शक्ती उरली नव्हती . आश्रमातील अधिकारी स्वामी चंद्रानंद महाराज म्हणून होते . त्यांना नमस्कार केला आणि विचारले कुठे आहे सिंगाजी महाराजांची समाधी ? ते म्हणाले आपण आता नदीच्या काठावर आहोत .  असेच सरळ रेषेत दोन एक किलोमीटर चालत नदीपात्रामध्ये गेले की बाबांची समाधी आहे ! बापरे म्हणजे आज चालण्याचे अर्धशतक होणार तर ! पाय बोलायला लागणार त्याच्या आधीच झटकन उठलो आणि समाधीच्या दिशेने मार्गस्थ झालो ! जय सिंगाजी ! नर्मदे हर !


लेखांक चौसष्ठ समाप्त (क्रमशः )

लेखांक ६६ : कापसाला विक्रमी भाव देणारी मुंदीची मंडी आणि भमोऱ्याची काळझोप

आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान ४० किलोमीटर चालले , तरच ओंकारेश्वरला महाशिवरात्रीला पोहोचता येईल हे मी माझ्या मनाला बजावून सांगत होतो .सिंगाजी महाराज समाधी पिपल्या माफी नावाच्या गावात आहे इथून निघाल्यावर भेंसावा , गोराडिया , मुंडी ,भमोरा , मोहद , कैनुद ,जलवा बुजुर्ग ,देवला , खूटला कला , अटूट खास , सूलगांव किमान इतकी गावे पार केली असती की मग ओंकारेश्वर ३० किलोमीटर राहणार होते .परंतु हे सर्व करताना वाटेतील तीर्थक्षेत्रे देखील पहायची होती. एखादे महत्त्वाचे स्थान सोडून तुम्ही पुढे गेलेले नर्मदा मातेला आवडत नाही असा अनुभव होता . त्यामुळे इथे मध्ये असलेले लोटेश्वर महादेवाचे तीर्थ पाहून पुढे जावे असा विचार करून मंदिरात गेलो . दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेऊन पुढे निघालो . 
श्री लोटेश्वर महादेव मुंदी
श्री लोटेश्वर महादेव मंदिर मुंदी . मंदिर अतिशय पुरातन व सुंदर आहे .
आज बहुतांश रस्त्याने चालायचे होते . मुंदी हे तुलनेने मोठे गाव आहे . मी आता खंडवा जिल्ह्यामध्ये होतो . प्रसिद्ध गायक किशोर कुमार हा याच गावातला . रस्त्याने चालता चालता नामस्मरण सुरू होते . काठाने चालताना एकसारखी लय मिळणे अवघड असते कारण पायाखालची जमीन सारखी बदलत असते . परंतु रस्त्याने मात्र एकाच गतीने आणि एकाच तालात चालता येते त्यामुळे नाम घेणे सोपे पडते . तालाचे ज्ञान असण्याचे काही फायदे आहेत परंतु काही तोटे आहेत त्यातला हा एक तोटा आहे . लय सापडल्याशिवाय नाम घ्यायला त्रास होतो . असो . मोहोड नावाचे गाव सोडल्यावर आणि लोटेश्वराचे महादेव मंदिर येण्यापूर्वी वाटेमध्ये एका पाटीने माझे लक्ष वेधून घेतले . मराठा हॉटेल अशी पाटी होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र लावलेले होते . हॉटेल वाल्याने आत बोलवले . सद्दूभाई मराठा नावाच्या भाजप नगरसेवकाचे हे हॉटेल होते .हा मुंदी गावात राहात होता व गावाबाहेर हे हॉटेल चालवत होता . हे मूळचे मराठा होते परंतु आता घरामध्ये मराठी कोणाला येत नाही असे म्हणाला . परंतु तरीदेखील मराठ्यांच्या जाज्वल्य परंपरेचा त्याला अतिशय अभिमान होता असे त्याच्याशी बोलताना जाणवले ! मला देखील महाराष्ट्राबाहेर लांब कुठेतरी एखादा मनुष्य संभाजी महाराज , शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास अगदी मराठा या नावासह मांडताना पाहून खूप बरे वाटले ! त्याच्या मोबाईलवर काही फोटो त्याने काढले आणि माझ्या मित्राला पाठवून दिले . हा मित्र देखील जातिवंत मराठा असल्यामुळे फोटो पाहिल्यावर त्यालाही अभिमान वाटला आणि तो फोनवर बराच वेळ सद्दूभाईशी बोलला . तोपर्यंत मी चहा पिऊन पुढे मार्गस्थ झालो होतो . 
मराठा ढाबा मुंदी खंडवा
सददूभाई मराठा सोबत प्रस्तुत लेखक .
याचे नाव सदन मराठा होते परंतु लोक प्रेमाने सद्दू भाई म्हणायचे . आपल्या एंटायसर मोटर सायकलच्या विंड शील्डवर पण त्याने मराठ्यांचा गौरव करणारे स्टिकर लावले होते . 
हॉटेलच्या पाटीवर त्याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या दोघांची चित्रे गौरवाने लावली होती .
गुजरात व मध्यप्रदेशातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मराठ्यांचे राज्य राहिले होते . बडोद्याचे गायकवाड ,इंदोर चे होळकर , धार चे पवार , ग्वाल्हेरचे शिंदे , देवासचे घाटगे अशी प्रसिद्ध सरदार घराणी होती . या सर्वांनी मराठ्यांची तेजस्वी परंपरा जागृत ठेवली त्यामुळेच या भागातील धर्म टिकला ,मंदिरे वाचली आणि नर्मदा परिक्रमा सुरू राहिली .नर्मदेने महाराष्ट्राचे रक्षण केले आणि महाराष्ट्राने नर्मदा वाचवली . महाराष्ट्राच्या डोक्यावर शिरोरेखा मारल्याप्रमाणे नर्मदा वाहत असल्यामुळे आणि चातुर्मासात तिचे दुथडी भरून वाहणारे विराट स्वरूप शत्रूला पार करता येत नसल्यामुळे महाराष्ट्रावर आक्रमण होत नसे . शेष भारतातही जिथे जिथे मराठ्यांचे घोडे फिरले तोच भाग आज भारतामध्ये शिल्लक आहे . जम्मू काश्मीरमध्ये मराठे कधी थेट गेले नाहीत .तो भाग आज आपल्यापासून तुटू पाहतो आहे .तंजावर पर्यंत निर्विवाद सत्ता असून देखील केरळ मध्ये मराठ्यांची सत्ता नव्हती त्यामुळे तोही भाग देश विघातक कारवायांचे आश्रयस्थान बनला आहे . बंगाल प्रांत पादाक्रांत करण्यासाठी निघालेले मराठे , नागपूरकर भोसल्यांच्या अधिपत्याखाली कटक पर्यंत पोहोचल्यावर इंग्रजानी कलकत्ता शहराभोवती मराठा डीच अर्थात मराठ्यांच्या भीतीने खंदक उभा केल्यामुळे मराठे तिकडे गेले नाहीत आणि आज तो एक वेगळा देश झालेला आहे . शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन लचित बर्फुकन नी ईशान्य भारतात मुगलांचा पाडाव केला . परंतु तरीदेखील कामरूप अर्थात आसाम वगळता ईशान्य भारतातील राजकारणावर मराठ्यांचा फारसा प्रभाव न राहिल्यामुळे ईशान्य भारताचे वेगाने ख्रिस्तीकरण झाले . पंजाब प्रांत देखील मराठ्यांच्या ताब्यात असता तर पाकिस्तानात कधीच गेला नसता .या उलट आजच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान हा प्रांत म्हणजे मुळात पानिपतच्या युद्धातून  अब्दाली ला पळवून लावताना त्या भागामध्ये स्थिरस्थावर झालेल्या मराठा व आता बुगती मराठा लोकांचा आहे .त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेले आहे . तात्पर्य मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक भारतीय माणसाला माहिती असणे आवश्यक आहे आणि तो भारतीय लोक तर सोडा साक्षात मराठी लोकांनाच माहिती नाही हे देखील पदोपदी परिक्रमेमध्ये जाणवले .सदन भाई मराठा याच्याशी बोलताना तोच मला म्हणाला की तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी शक्यतो कुठल्याच मराठी परिक्रमावासीना नसते . त्यांना हे माहितीच नसते की मध्य प्रदेश देखील कधीकाळी संपूर्णपणे मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता . आपल्याला शाळेमध्ये मराठ्यांचा इतिहास साकल्याने कधीही न शिकविण्याचा हा दुष्परिणाम आहे . नर्मदा परिक्रमा ही परंपरा जर टिकायची असेल तर त्यासाठी राजसत्ता देखील धर्मप्रेमी असणे अतिशय आवश्यक आहे . अन्यथा परिक्रमेची परंपरा बंद पडायला जरासा सुद्धा वेळ लागणार नाही ,हे मी लॉकडाऊन नामक हिडीस प्रकारावरून अमरकंटक इथे अनुभवले आहे . सुदैवाने नर्मदा परिक्रमेचे महात्म्य येथे सर्वच लोकांना माहिती असल्यामुळे ,अगदी काँग्रेसचे सर्वेसर्वा राहिलेले मध्यप्रदेश मधील एका राजघराण्यातील राजे , ज्यांना लोक प्रेमाने राजाजी किंवा डिग्गी राजा असे म्हणतात , ते दिग्विजय सिंग देखील १९० दिवसांची पायी परिक्रमा आपल्या तिसऱ्या पत्नीला सोबत घेऊन करून आलेले आहेत . त्यासंदर्भात मला नर्मदा मातेने एक सुरेख अनुभव देखील दिला आहे जो त्यावेळी सांगेन .शिवराज सिंह चौहान हे मी परिक्रमा केली त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी देखील बस मधून झंजावाती परिक्रमा केलेली आहे . त्यांचे गावी परिक्रमावासींची सेवा ते करतात . तसेच सुषमा स्वराज यांनी देखील एक परिक्रमा वासी सेवा केंद्र बांधलेले आहे . तात्पर्य नर्मदा परिक्रमेचे महात्म्य सध्या तरी सर्वच पक्ष मान्य करून आहेत . तसेच नर्मदा खंडातील महंतांना , साधूंना आणि संन्याशांना खिशामध्ये टाकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागलेली असते हे मला पदोपदी जाणवले . असो . आज लिखाणामध्ये पदोपदी राजकारण डोकावते आहे कारण आजचा दिवस पूर्णपणे राजकारणी लोकांच्या सहवासातच गेला . नर्मदा मातेची इच्छा . दुसरे काय ! इथून दुपारचे भोजन देखील भाजपच्या एका नगरसेविका असलेल्या मातारामच्या घरीच घेतले . तत्पूर्वी एक गमतीशीर घटना घडली ! चालत जाताना अचानक मला तो रस्ता त्या गल्ल्या तो सगळा परिसर ओळखीचा वाटू लागला ! असे वाटू लागले की आपण येथे पूर्वी कधीतरी आलेलो आहोत ! याला फ्रेंच भाषेमध्ये déja vous देजा वू असे म्हणतात .थोड्यावेळाने उजवीकडे एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती दिसू लागली . आणि माझ्या गतस्मृती जागृत होऊ लागल्या ! तिथे असलेल्या वॉचमनची परवानगी घेऊन मी आत मध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आले की , होय !ही तीच मंडई होती जिथे मी दहा वर्षांपूर्वी आलो होतो ! 

"लेलो लेलो ! मंदिर का कापूस लेलो !आश्रम का कपास लेलो! रोज पैसा कमाते हो आज पुण्य कमाओ ! जो जादा भाव देगा उसी को आशीर्वाद मिलेगा ! जो कम बोली लगाएगा ,भगवान उसका भी भला करेगा ! "

मला मीच तिथे उभा राहून ओरडत असलेला दिसलो ! होय दहा वर्षांपूर्वी इथे उभे राहून मी अगदी हेच केले होते ! आणि अगदी इथेच उभे राहून हे केले होते !
सविस्तर सांगतो . त्याचे काय आहे ,
इथून महाराष्ट्राची सीमा तशी जवळ आहे . धुळे नंदुरबार जळगाव शिरपूर हा परिसर इथून जवळ आहे . नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या काठावर टाकरखेडा गावामध्ये माझ्या गुरूंची (परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा ) समाधी आहे . दहा वर्षांपूर्वी ते देहामध्ये असताना मी एकदा तिथे काही कामानिमित्त गेलो होतो . आश्रमाला पाच एकर शेती दान म्हणून मिळालेली आहे . शिवा भाऊ नावाचे कोल्हापूर मधील एक शेतकरी ती सर्व शेती सांभाळतात . आणि त्याच भागातील काही तरुण भक्तमंडळी शेतीच्या अन्य कामांमध्ये स्वामींना मदत करायचे . उदाहरणार्थ फैजपूर येथील किशोर पाटील किंवा चिनावल येथील रवी पाटील असे तरुण शेतीचा माल बाजारात नेऊन टाकणे वगैरे कामासाठी मदत करायचे . 
 किशोर पाटील चिनावल आपल्या ट्रॅक्टर सोबत
त्या काळामध्ये महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळत नसे . आणि आश्रमाचा भरपूर कापूस निघाला होता . महाराष्ट्रामध्ये ३६०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल भाव चालू होता . पाव किलो वजनाची जीन्स पाच हजार रुपयाला विकत घेणाऱ्या माणसाला हे गणित लवकर कळेल . विचार करा .तुमचा १०० किलो कापूस विकल्यावर छत्तीसशे रुपये मात्र मिळाले तर कसे वाटेल ! त्या काळात मध्यप्रदेश सरकार कापसाला चांगला भाव देते अशी वदंता होती . त्यामुळे आश्रमाचा कापूस विकण्यासाठी किशोर पाटील ट्रॅक्टर मध्ये भरून खंडव्याला निघाला . तो एकटाच जाणार आणि एकटाच येणार होता म्हणून त्याला सोबत म्हणून मी देखील निघालो . त्यात कापसाच्या ढिगार्‍यावर झोपून जाण्याचा आनंद काही वेगळाच होता ! प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा खूप लांबचा निघाला त्यामुळे मी कापसामध्ये खड्डा करून त्यात शिरून झोपून टाकले .खाली वर सर्वत्र कापूसच कापूस ! त्या काळात मुंदी बाजारात सर्वात जास्त भाव मिळायचा . जास्त म्हणजे किती ५२०० रुपये प्रतिक्विंटल ! परंतु तेवढा सुद्धा भाव भरपूर वाटेल अशी परिस्थिती होती . मी त्या दिवशी पहिल्यांदाच कापसाचा लिलाव कसा असतो ते पाहिले . व्यापारी यायचे . दलाल असायचे . शेतकऱ्यांना बाजूला उभे करायचे आणि कापसामधील दोष शोधून दाखवायचे . हा कापूस पांढराच नाही .याच्यामध्ये खूप कचरा आहे . हा थोडासा भिजलेला आहे . वगैरे वाटेल ते कारण सांगून कापसाचा भाव पाडून द्यायचे . वर्षभर राब राब राबून मेहनत करून स्वतःच्या घामाच्या आणि रक्ताच्या बळावर उगवलेला हा कापूस तिथेच टाकून परत जाणे शक्य नसल्यामुळे येईल तो भाव मान्य करून शेतकरी निमुटपणे घरी जायचा . मला या बाजाराची मोडस ऑपरेंडी लक्षात आली . सर्व शेतकरी तिथे पत्ते खेळत बसलेले असताना मी मात्र माझ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या कापसाची मागची दर्शनी बाजू होती ती स्वच्छ करायला सुरुवात केली . दोन तास राबून संपूर्ण आठ फूट बाय सहा फूट दर्शनी कापसातील कचऱ्याचा कण आणि कण मी बाजूला काढला . सर्व शेतकरी मला हसू लागले . ते म्हणाले अरे तू शहरातला मुलगा , तुला काय अक्कल आहे ! मी त्यांना इतकेच म्हणालो . तुम्हाला या कापसाला विक्रमी भाव नाही मिळवून दिला तर गुरूंचे नाव कोणाला सांगणार नाही . ते म्हणाले की अरे असा वरवर कापूस स्वच्छ करून काही उपयोग नाही .ते आत मध्ये हात घालून कापूस बाहेर काढतात आणि बघतात .हा प्रकार देखील मी पाहिलेला होता त्यामुळे मी एका ठिकाणी हात घालून कापूस बाहेर काढला तो स्वच्छ करून पुन्हा दाबला .आणि तिथे अशी जागा निर्माण केली की माणसाला हात घालायला सोपे जाईल . बाकीच्या ठिकाणी फळीने चोपून चोपून मी कापूस सपाट करून टाकला . शेजारच्या शेतकऱ्याच्या गाडीपाशी व्यापारी आले आणि अतिशय हीन दर्जाची शेरेबाजी करून त्याला कसाबसा ४५०० रुपये भाव दिला .तो बिचारा तोंड बारीक करून बसला .खरं पाहायला गेलं तर त्याचा धागा माझ्या कापसा हून अधिक चांगला होता .
  कापसाचा लिलाव झाला ती शेड
 झाले व्यापारी आमच्या गाडीपाशी आले . ते काही बोलणार इतक्यात मीच बोलायला सुरुवात केली ! 
"लेलो लेलो ! मंदिर का कापूस लेलो !आश्रम का कपास लेलो! रोज पैसा कमाते हो आज पुण्य कमाओ ! जो जादा भाव देगा उसी को आशीर्वाद मिलेगा ! जो कम बोली लगाएगा ,भगवान उसका भी भला करेगा ! "
पहिलीच बोली लागली पाच हजार ! दुसरी बोली लागली पाच हजार वीस रुपये ! मी ओरडतच म्हणालो "पुण्य की गिनती दस बीस मे मत करो । तुम सौ बोलोगे भगवान दो सौ देगा । तुम पाच सौ बोलोगे भगवान हजार देगा "
अशा पद्धतीने स्वतः मार्केटिंग करून विकणारा शेतकरी बाजारामध्ये पहिल्यांदाच दिसत असल्यामुळे दलाल आणि व्यापारी सुद्धा थोडेसे त्रस्त झाले होते . एक जण मला म्हणाला शेतकऱ्याने या लिलावात बोलायचे नसते . मी म्हणालो , " साल भर जो पसीना बहायेगा वही बोलेगा ! मेहनत की कमाई खाएगा वही चैन की नींद सोएगा !  आदमी का उगाया माल व्यापारी ले जायेगा । भगवान का उगाया माल भक्त ले जायेगा ।लगाव बोली ! किसको कितना पुण्य चाहिये ? " त्या व्यापाराने चिडून कापूस बाहेर काढला . त्याने बरोबर त्याच ठिकाणी हात घातला जिथे त्याने हात घालावा अशी योजना मी करून ठेवली होती ! आपला कापूस देखील स्वच्छ आहे हे पाहून त्याला काहीच बोलता येईना ! पुढची बोली लागली सहा हजार ! त्यानंतर साडेसहा हजार !त्यानंतर सात हजार आणि शेवटी सात हजार दोनशे ! त्या दिवशीची त्या बाजारातली ती सर्वाधिक बोली ठरली ! त्याच्या खालोखाल सर्वाधिक मिळाले होते पाच हजार एकशे रुपये .इतकी बोलींमध्ये तफावत होती . बरे पुढे गेल्यावर हा सर्व कापूस एकत्रच जिनिंग मिल मध्ये जात असे म्हणजे तसा या बोलींना काहीच अर्थ नसायचा !व्यापारी पुढे निघून गेल्यावर सगळे शेतकरी मला डोक्यावर घेऊन नाचू लागले ! त्यादिवशी मी सगळ्यांना चहा पाजला होता !  मला हा सगळा प्रसंग जणू काही आत्ताच घडून गेला आहे असा आठवू लागला ! 
शेतकऱ्यांना मी सांगितले , "वर्षभर तुम्ही इतकी मेहनत करता मग ज्या क्षणी माल विकला जाणार आहे त्या क्षणी तुम्ही मागे का राहता ? त्या क्षणी देखील तुम्ही बोलले पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या मालाचे मार्केटिंग करता आलेच पाहिजे ! पत्ते खेळत बसण्यापेक्षा थोडीशी मेहनत जर त्या दिवशी केली तर ती तुम्हाला खूप जास्ती फायदा मिळवून देऊ शकते . "सर्वांना हे म्हणणे पटले . अर्थात यासाठी आधी दलालशाही वरचे अवलंबित्व कमी करणे हे देखील आवश्यक आहे . परंतु अनेक वर्षांचे हितसंबंध असल्यामुळे नवीन बदल स्वीकारायला आपल्या इथली समाज व्यवस्था लवकर तयार होत नाहीये . त्यामुळेच मोदींनी केलेले तीन कृषी विषयक कायदे त्यांना विनाकारण विनाशर्त मागे घ्यावे लागले . कारण दलालांच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत . शेतकरी संघटित नाही आणि शेतकरी संघटनांच्या नावाखाली संघटित असलेले शेतकरी नाहीत ! शेतकऱ्याला संघटना काढून आंदोलन करायला वेळच नाही ! सगळीच गंमत आहे .शेतीचे आणि नर्मदेचे असे अभिन्न नाते आहे . असो ! नर्मदे हर ! 
या सर्व आठवणी ताज्या झाल्यावर मी बाहेर आलो आणि तो चहावाला कुठे दिसतो का ते पाहू लागलो . चहाच्या जागी उसाच्या रसाचे गुऱ्हाळे होते . त्याने मला उसाचा रस पाजला आणि मग मी पुढे निघालो . मुंदी गावामध्ये दुर्गा मातेचे एक मंदिर असून तिथे परिक्रमा वासी उतरतात आणि भोजन प्रसादी तिकडे आणून दिली जाते असे मला वाटेत अनेकांनी सांगितले . त्यामुळे मी दुर्गा माता मंदिरात पोहोचलो . पुजारी बुवांनी मला बसायला सांगितले आणि ते भोजन प्रसाद ज्या घरातून येतो त्या घरी वर्दी देण्यासाठी गेले . दुर्गा मातेचे मंदिर अगदी बाजाराच्या मधोमध बांधण्यात आले होते . 
ऐन बाजारपेठेतील श्रीदुर्गा माता मंदिर मुंदी
रात्री मंदिर आकर्षक दिसते
 श्रीदुर्गा माता
प्रचंड गर्दी बाजारात इकडून तिकडे चालली होती . इथे समोरच असलेल्या गोमाता कॉम्प्युटर या दुकानाने माझे लक्ष वेधले . आधुनिकीकरण आणि परंपरा याचा उत्तम मिलाफ मला त्या नावात आढळला !
अशा छोट्या छोट्या इमारतींची दाटी या गावात होती .
गौ माता कॉम्प्युटर्सची पाटी आपल्या ब्रँड अँबेसिडर अर्थात शुभंकरा सह ! 
पुजारी पुन्हा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आपण घरी जेवायला येता का ?काही परिक्रमावासी आणि साधू देखील गृहस्थी माणसांच्या घरामध्ये जात नाहीत . परंतु आपल्या नियमांचा इतरांना त्रास होतो आहे का याचा देखील विचार विवेकाने करावासा मला वाटला . माझ्या एकट्या करता सारे पदार्थ भरून वरून खाली आणण्यापेक्षा मी एकट्याने वर जाऊन बाहेर बसून पटकन चार घास गिळलेले कधीही सोयीचे होते . मी होकार दिला आणि अतिशय छोट्या जिन्याने वर जाऊन अशाच एका घराच्या बाहेर बसून राहिलो . हे घर तिथल्या एका भाजपा नगरसेविकेचे होते आणि त्या स्वतः स्वयंपाक करत होत्या . त्या मातेने फार प्रेमाने मला खाऊ घातले . दहा बारा , पंधरा वीस परिक्रमावासी असतील तर खाली भोजन नेऊन वाढणे सोयीचे असते असे त्या मातेने मला सांगितले जे योग्यच होते. मी देखील आज मला भरपूर चालायचे आहे असे सांगून तिथे (दुर्गा माता मंदिरात ) विश्रांती न घेता लगेचच पुढे प्रस्थान ठेवले . जाता जाता पंडितजींनी वहीमध्ये शिक्का दिला .
पंडित श्री भूपेंद्र शास्त्री ,माता मंदिर मुंदी जिल्हा खंडवा मा नर्मदा परिक्रमा सेवा मोबाईल ९९७७३५९७४७ . मी इथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जेवलो .
अतिशय वेगाने चालत निघालो होतो . माझा बूट पूर्णपणे झिजला होता . त्यात डांबरी रस्त्यावरून चालताना पायाखाली येणारा प्रत्येक खडा जाणवत होता ! इतके दिवस मी नर्मदा मातेचा किनारा पकडलेला असल्यामुळे खडे टोचण्याचे दुःख जाणवले नव्हते .परंतु आता मात्र पदोपदी पायाला त्रास होत होता . मनामध्ये बुटाबद्दल थोडासा विचार आला परंतु मी चालत राहिलो . नवीन बूट घेण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा लवकरात लवकर ओंकारेश्वर गाठणे हे माझ्यासाठी प्राधान्याचे होते . गावातून थोडासा बाहेर पडलो असेल इतक्यात एका माणसाने आवाज दिला . नर्मदे हर ! त्या सज्जनांनी मला मागून पळत येऊन गाठले . मला म्हणाले मुझे आपकी सेवा करने का कुछ मौका दिजीये । मी म्हणालो मुझे जल्द से जल्द ओंकार जी पहुचना है । इसलिये मुझे कुछ नही चाहिये । मै निकलता हु । या भागात ओंकारेश्वरला ओंकार जी असे पण म्हणतात . या माणसाचे नाव होते रामजी मुजमेर . जातीने ब्राह्मण होता . म्हणजे त्यानेच तशी ओळख करून दिली . अखेरीस तो मला म्हणाला की कमंडलू या जूते तो ले लीजिएगा बाबाजी । अब मना नही करना । मेरे मित्र की आंगे दुकान है । चलिये । आता माझा नाईलाज झाला आणि त्याच्या मागे मी चालू लागलो . पहिल्याच चौकात थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला चपलांचे दुकान होते . याने मला आत मध्ये बसविले आणि दुकानदाराला सांगितले की बाबाजींसाठी सर्वात चांगला कुठला बूट आहे तो दाखव . मी सुरुवातीलाच त्याला सांगितले की माझ्याकडे वेळ कमी आहे . त्यामुळे कुठलाही एक साधा बूट किंवा चप्पल मला द्या आणि मोकळे करा . त्याने काढलेले सर्व बूट महागातले होते हे माझ्या लक्षात आले . मला रामजी मुजमेरला खड्ड्यामध्ये घालायचे नव्हते . त्यामुळे ज्याला लोफर म्हणतात तशी एक रबरी चप्पल मला सापडली ती स्वस्तात मस्त म्हणून मी निवडली . या नर्मदा परिक्रमेतील ते माझे सहावे पादत्राण ठरले ! पाचव्या बुटाने १३ दिवस साथ दिली .  मला खूप तहान लागली होती म्हणून मी त्याला पाणी मागितले . दुकानदार एक क्षणभर थांबला आणि रामजीच्या चेहऱ्याकडे बघू लागला . रामजी म्हणाला रुको मै पानी लेके आता हू । मी विचारले , काय झाले ? घरी पाणी नाही का ? दुकानाच्या मागेच घर होते .दुकानदार मला म्हणाला हम हरिजन है । हमारा पाणी आपको कैसे चलेगा ? मी म्हणालो अरे वा ! ये तो और भी अच्छी बात हुई ! हम भी हरीके जन है ! हरी का नाम लेके ही घर से निकले है । आप भी हरिजन ! मै भी हरिजन ! और क्या चाहिये पानी लाइये । चर्मकार रामाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या . रामजी देखील डोळे पुसू लागले . त्याने मुलाला आवाज दिला आणि पाणी मागवले . मुलाने देखील तांब्याभर पाणी चांगले बर्फ टाकून आणून दिले . ते थंडगार पाणी पिल्यावर मला फारच बरे वाटले ! मी माझा कमंडलू दिला आणि तो देखील भरून घेतला . याने त्यात देखील बर्फाचे खडे भरले . मैया चा किनारा सोडल्यापासून गार पाणी मिळाले नव्हते . रामजी मुझमेर यांना देखील खूप आनंद झाला . चांभार आणि मला दोन मोजे असेच ठेवा म्हणून दिले . त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की मोबाईल वर बाबाजींचा फोटो काढून ठेव . लोकांचा फोटो काढताना हात हलतो हे माहिती असल्यामुळे बरेचदा मीच त्यांच्या मोबाईलवर फोटो काढून त्यांना ठेवायला द्यायचो .तसा फोटो काढून मी त्याला दिला . त्याने माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
 मुंदी येथील चपलांच्या दुकानात प्रस्तुत लेखक श्री रामजी मुझमेर आणि चर्मकार बंधू

त्या सर्वांचे आभार मानून मी पुढे निघालो . रामजी मला म्हणाला तुमची हरकत नसेल तर थोडे अंतर तुमच्या सोबत चालू का ! मी त्याला म्हणालो की मला रस्ता सापडेल .काही गरज नाही . परंतु त्यांची परिक्रमा मार्ग थोडासा चालण्याची इच्छा होती .कारण माझ्यासोबत नर्मदा मैय्या होती ना ! म्हणून ! मी नकार देणारा कोण ? मग लगेच चला म्हणालो ! हा मनुष्य म्हणजे सात्विकतेचा परिपाकच होता ! इतका सज्जन माणूस आजकालच्या काळात टिकणे फार अवघड आहे ! त्यांनी मला विचारले मगाशी आम्ही दोघे का रडलो तुम्हाला लक्षात आले का ? मी नाही म्हटल्यावर त्यांनी जाता जाताच मला दूरवर उजव्या हाताला दिसणारे एक मंदिर दाखवले . हे सिंगाजी महाराजांचे शिष्य होते . बुखारदास महाराज .त्यांना एकदा गावातील एका हरिजन बाईने भाजी भाकरी आणून दिली .  महाराजांनी ती खाल्ली आणि ती बातमी बघता बघता गावात सर्वत्र पसरली . गावातील सर्व अन्य जातीचे लोक तिथे जमा झाले आणि बहिष्काराची भाषा करू लागले . महाराजांना सांगू लागले की तुम्ही चुकीचं वागलात . महाराज म्हणाले माझी चूक काय ते सांगा . लोक म्हणाले तुम्ही हरिजन बाईच्या घरचे जेवण जेवायला नको पाहिजे होते . महाराज म्हणाले ,हत्तीच्या ! एवढंच ना ! हे घ्या तिच्या घरचे जेवण !  असे म्हणून महाराजांनी आपल्या तोंडावाटे पोटात हात घातला आणि पोटातून भाजी भाकरी आहे तशी बाहेर काढली ! म्हणले आता तरी मी पवित्र झालो ना ? हा प्रकार बघून सर्वांची बोबडी वळाली आणि सर्वांना महाराजांचा अधिकार काय आहे ते कळाले . त्यावेळी महाराज सर्वांना सांगू लागले ही अरे आपण सर्वच जण हरीचे जन आहोत . त्यामुळे असा भेदभाव कधीही करू नका ! त्या दोघांना देखील माझे वाक्य ऐकल्यावर महाराजांची आठवण झाली . म्हणून डोळ्यात पाणी आले . आणि आत्तासुद्धा रामजी मुजमेर मला ते मंदिर दाखवण्याकरता म्हणून खास चालत आले होते . मी जागेवरूनच त्या महाराजांना साष्टांग नमस्कार घातला !
या संतांचे नाव बुखारदास बाबा असे होते . मुंदी गावाच्या बाहेर यांचे समाधी मंदिर आहे . 
बुखार दास बाबा समाधी मंदिर मुंदी
डावीकडचे बुखारदास महाराज आणि उजवीकडचे गुलाबदास महाराज
  असे अधिकारी सत्पुरुष आता फार कमी उरले आहेत . मला असे काही बोलायची बुद्धी झाली याचे कारण बुखारदास महाराजांची अतिशय जबरदस्त स्पंदने या संपूर्ण परिसरामध्ये आहेत . त्यांचाच तो प्रभाव होता . इथून मी रामजी महाराजांना रजा दिली कारण माझी गती गप्पांमुळे कमी होऊ लागली होती . त्यांनी देखील साश्रु नयनांनी मला पुढे पाठविले .
इथे एक अशी घटना घडली जिने पुन्हा एकदा एक परिक्रमावासी म्हणून माझी परीक्षा पाहिली ! थोडेसे अंतर चाललो असेन नसेन इतक्यात मला पुन्हा एकदा गार पाणी प्यायची इच्छा झाली . डोक्यावर खूप कडक ऊन होते . डाव्या हाताला गंगा मातेचे एक मंदिर दिसले .आज संध्याकाळपर्यंत मला तीस किलोमीटर चालायचे होते त्यामुळे एकदा पाणी पिऊन सुटावे ते थांबूच नये असा मी विचार केला . मंदिरात गंगेचे दर्शन घेऊन डाव्या बाजूला एका कोपऱ्यात टेकून बसलो . बर्फ टाकलेले गार पाणी पिण्याचा एक तोटा असतो की त्याने तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावे असे वाटते . तसेही थोडे चालल्यावर कमांडलूतील पाणी उन्हाने गरम होणार होते . त्यापेक्षा ते गार गार आहे तोवर प्यावे असा विचार करून मी पाणी प्यायलो . गार पाणी पिण्याचा आनंदच काही वेगळा आहे ! तो गारवा थेट मेंदूपर्यंत पोहोचला ! मी तोंडावरून गार पाण्याचा एक हात फिरवला ! मग तर स्वर्गीय सुखाचा अनुभव येऊ लागला ! थंडगार वाऱ्याची झुळूक सुटली होती . मी डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेतला .  बाहेर उन्हाचा तडाखा होता . डोळे मिटल्याबरोबर तो दाह देखील शांत झाला !
गंगामाता मंदिर मुंदी केनुद
इथेच डाव्या हाताला नर्मदा मातेचा फोटो दिसतो आहे त्याच्या आतील कोपऱ्यात मी बसलो होतो
... . . . . असेच काही क्षण गेले असतील . मला असे जाणवले की माझ्या मांडीवर काहीतरी वळवळते आहे . म्हणून मी डोळे उघडले . पाहतो तो काय ! सर्वत्र अंधार पसरलेला ! मला एक क्षणभर काहीच कळेना ! आत्ता इतके कडक ऊन पडले होते आणि अचानक अंधार कसा काय पडला ? आणि मांडीवर काय वळवळते आहे म्हणून पाहिले तर माझ्या मांडीवर एक तहाने बाळ होते ! माझ्या मांडीवर तहाने बाळ ठेवून एक बाई माझ्यासमोर हात जोडून उभी होती ! मी तिला नर्मदे हर केले आणि विचारले ये किसका बच्चा है ? ती म्हणाली मेरी पोती है । उसको पहली बार भगवान के दर्शन करने के लिए घर से बाहर लायी हू । आपके गोद मे डाला ताकी उसको परिक्रमा का पुण्य मिले । मी आजूबाजूला पडलेला अंधार पाहिला आणि तिला विचारले यह सब अंधेरा कैसे हो गया ? ती म्हणाली बाबाजी शाम हो गई है । यहा इसी समय अंधेरा हो जाता है । परंतु मला तर दुपारी मी इथे बसल्याचे स्मरत होते ! मी तिला सांगितले की मी दुपारी इथे बसलो होतो . ती म्हणाली मेरा सामने ही घर है । मै सुबह से देख रही हू । आप इधरही ध्यान लगाए बैठे हुए थे ।  मी म्हणालो अग बाई मग मला तू उठवले का नाहीस ! ती म्हणाली ऐसे कैसे उठाते ! आपकी समाधी भंग हो जाती । वह पाप हम नही कर सकते ।
इसलिये आपको उठाया नही । मला आता रडावे असे वाटायला लागले ! मी तब्बल ३० किलोमीटर मागे पडलो होतो ! आता ओंकारेश्वरला शिवरात्रीपर्यंत पोहोचणे अवघड आहे असे मला वाटू लागले . संपूर्ण दिवसभर मी जरा देखील न हलता आहे त्याच परिस्थितीमध्ये गाढ झोपून गेलो होतो .अगदी माझी मांडी देखील बदलली नव्हती . त्या बाईने माझ्या मांडीवर लेकरू आणून ठेवले म्हणून मी जागा तरी झालो नाही तर बहुतेक सकाळीच जाग आली असती ! मला माझ्या या तमोगुणी झोपेचा फारच राग आला ! गंगा मातेकडे पाहिले तर ती हसत होती ! दोन परस्पर विरोधी राजकीय पक्ष जसे एकमेकांचे उमेदवार पाडतात तसे या गंगा आणि नर्मदा मातेचे काय आहे की काय असे मला वाटायला लागले ! मैय्या ये तूने क्या कर दिया रे !  मी देखील इरेला पेटलो ! काय वाटेल ते करून पुढे जायचेच असे ठरवून मी चालायला लागलो ! थोडे अंतर गेल्यावर उजव्या हाताला एक बाल हनुमान मंदिर आले . मारुतीचे दर्शन घेतले असताना आत मध्ये असलेला साधू मला म्हणाला यहा मुकाम नही हो पायेगा । आगे भमोरी गाव मे परिक्रमा वासियों की सेवा होती है ।मी त्या साधूला गंगामाता मंदिरात झालेला किस्सा सांगितला आणि आज रात्रभर मी चालणार आहे असे देखील सांगितले . त्याने मला सांगितले की रात्री या भागातून चालणे सोयीचे नाही . आणि परिक्रमेच्या नियमांमध्ये बसणारे देखील नाही .त्यामुळे भमोरी गावात मुक्काम करावा आणि सकाळी लवकर निघावे .
 साधूने मला आग्रहाने थोडा चहा पाजला आणि मी पुढे निघालो .
केनुद येथील बाल हनुमान मंदिर
बाल हनुमंताचे दर्शन घ्या .
थोडेसे अंतर चालल्यावर भमोरी गाव आले .भमोरेश्वर महादेवाच्या मंदिरात मी दर्शनासाठी गेलो . इथे यादव नावाचा एक शेतकरी होता त्याने त्याच्या घरी मला मुक्कामासाठी नेले . घर मंदिराच्या अगदी समोर रस्त्यावरतीच होते आणि मुक्काम अंगणात होता . 
जीर्णोद्धार झालेले भमोरेश्वर महादेवाचे मंदिर .मी गेलो तेव्हा या मंदिराचे काम सुरू होते
यादव यांचे छोटेसे दुकान , डेअरी असून परिक्रमावासीं ची सर्व सेवा ते करतात
यादव यांचे हेच घर आहे जिथे मी मुक्काम केला . मागे जे नवीन बांधकाम दिसते आहे तिथे छोटेसे अंगण होते जिथे मी झोपलो होतो .
या संपूर्ण प्रांताला नेमाड किंवा निमाड असे म्हणतात त्यामुळे येथे हिंदी भाषा कमी चालते व निमाडी भाषा जास्त चालते . हे यादव तीन भाऊ आणि त्यांची सहा मुले आणि एक मुलगी असा एकत्र परिवार होता . धाकटे अतुल आणि अनमोल खूपच हुशार होते ! सर्व मुले आल्यापासून मलाच चिकटून बसली ! लहान मुलांची जिज्ञासा मला फार आवडते !त्यांना सतत नवीन काहीतरी शिकायचे असते किंवा नवीन काहीतरी करून पहायचे असते ! अशी जिज्ञासा जोवर तुमच्या ठायी शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही लहान मूल आहात असे समजायला हरकत नाही ! त्यांनी मला निमाडी भाषा कशी बोलायची वगैरे सांगितले . त्याच्याबदल्यात मी त्यांना भरपूर चित्रे काढून दिली . आणि गप्पा मारत बसलो . घोड्यांचा विषय निघाल्यावर यांनी सांगितले की त्यांच्या पण गावामध्ये घोडा आहे .तोपर्यंत अनमोल धावत गेला आणि लखन यादव या माणसाला घेऊन आला . याच्याकडे स्वतःची घोडी होती. बिजली नावाची एक अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाची घोडी होती . हिला त्याने नाचायला आणि अलप करायला म्हणजे मागच्या दोन पायांवर उभे राहायला शिकवले होते . मला व्यक्तिशः घोड्यांना नाचवणे आवडत नाही .कारण तुम्हाला वाटते तो नाचत आहे .परंतु तो तुमच्या भीतीने हालचाली करत असतो . तो नाचण्यासाठी बनलेला प्राणी नाही . एखाद्या स्पेशल फॉर्सेस मधल्या जवानाला भरतनाट्यम करायला लावण्या सारखे हे निंद्य आहे ! लखन लगेचच बिजलीला घेऊन आला . नाचकाम सुरु झाले . लखन यादव दारू पिला होता तरीदेखील घोडीला चांगली दामटवत होता . मला त्या मुक्या जनावराची फार दया आली . गावात अजून एक छोटीशी पांढरीच धनगरी घोडी होती . अशा घोड्यांना तट्टू म्हणतात . पण ही अडेल तट्टू होती . अडेलतट्टू हा शब्द अशाच घोड्यांसाठी वापरला जायचा .त्यातून मराठी भाषेत आला आहे .अडेल म्हणजे स्वतःला हवे ते करणारी . मालकाचे न ऐकणारी . "अडेल तट्टू आणि खोडेल जनावर , मारल्याशिवाय ऐकत नाही " अशी एक म्हण माझ्यासाठी माझी आजी नेहमी वापरायची ती मला या निमित्ताने आठवली ! असो . रात्री सुरेख असा भोजन प्रसाद घेतला आणि यादव बंधूंशी गप्पा मारत झोपी गेलो पहाटे शक्य तितक्या लवकर उठून निघायचे नियोजन होते .चार वाजताच जाग आली . सर्व आन्हीके आटोपून अंधारातच पाय उचलला . दोन दिवसांचे अंतर मला एका दिवसात चालायचे होते ! मी डोक्यात एकच गणित ठेवले ! आज कुठेही कशासाठीही थांबायचे नाही ! फक्त चालत राहायचे ! वेदांनी आपल्याला दिलेली ती आज्ञा आहे ! चरैवेति । चरैवेति ।
चर + इव + इति अर्थात चालत राहा . चालत राहा .थांबू नका ! पायांना गती दिली आणि स्वतःला सांगितले . आज एकादशी आहे . आता ओंकारेश्वर येईपर्यंत ,महाशिवरात्र होईपर्यंत ,
चरैवेति । चरैवेति ।


लेखांक सहासष्ट समाप्त (क्रमशः )

लेखांक ६७ : मैय्याने महाशिवरात्रीला गाठविला माझ्या नर्मदा परिक्रमेचा मध्य बिंदू , श्री क्षेत्र ओंकारेश्वर अमलेश्वर

आजची रात्र म्हणजे महाशिवरात्र होती ! पहाटेच्या अंधारातच मी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली . कोणी सांगितले होते ओंकारेश्वर साठ किलोमीटर आहे . कोणी सांगितले होते ७० किलोमीटर आहे . तर कोणी सांगत होते आम्ही चालत आरामात ओंकारेश्वर ला पोहोचू शकतो .कोणी सांगितले कितीही चाललात तरी तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचणे शक्यच नाही ! आदल्या रात्री ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून मला अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळाले ! ऐकावे जनाचे करावे मनाचे !
 श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
 मी एकच निश्चय केला . एक मिनिट थांबणे म्हणजे एक मिनिटाचे चालणे वाचवणे . अर्थात तेवढ्या अंतराने मागे पडणे . त्यामुळे काहीही झाले तरी आज कुठल्याही कामासाठी एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही ! फक्त चालत राहायचं ! चालतच रहायचं ! चरैवेति । चरैवेति ।
माझ्या डोक्यात सतत गणिते सुरू होती . काल जेवढे अंतर चालायचे नियोजन मी केलेले होते तेवढे जरी अंतर मी सूर्योदयापूर्वी तोडू शकलो असतो तरी जणू काही कालचा दिवस माझ्या आयुष्यात आलाच नव्हता असे झाले असते ! आणि सूर्योदयापासून नवीन जोमाने मी चालणे सुरू केले असते . पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावरती कोणीच असणार नाही असा माझा अंदाज होता . परंतु माझ्या लक्षात आले की जसजशी पहाट होते आहे तस तशा रस्त्यावरून खूप सार्‍या गाड्या जाऊ लागल्या ! आसपासच्या खेड्यापाड्यातील लोक सहकुटुंब सहपरिवार ओंकारेश्वरला निघाले होते . ट्रॅक्टर करून , गाड्या भरून ,जीप भरून आणि सर्वात जास्त म्हणजे एकेका दुचाकी वर तीन तीन , चार चार ,प्रसंगी पाच पाच लोक बसून भरधाव वेगाने धावत होते ! त्यांचे ते धोकादायक वाहन चालन पाहून माझी पाचावरच धरण बसली ! इतका आत्मविश्वास कुठून आणतात लोक ? नाही माहिती ! देवावरचा विश्वास अधिक दृढ करणारा तो प्रकार होता . पाच जणांना घेऊन जाणारी हिरो होंडा केवळ महादेवच वाचवू शकतात . टाकीवर बसून ती गाडी दामटणारा वाहन चालक तर तिला वळवू सुद्धा शकत नाही !एक पुरुष गाडी चालवतो आहे आणि तीन स्त्रिया एका बाजूला पाय सोडून बसले आहेत कल्पना करून पहा ! हे सर्व आदिवासी लोक होते . अतिशय चिवट काटक आणि धाडसी ! इथल्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेतात . पाठ संपूर्ण झाकून घेतात . आणि समोरून पदर नसतो . यांच्या हाताच्या दंडामध्ये चांदीचे बाजूबंद किंवा वाक्या असतात . नागमोडी आकाराच्या या वाक्या अंधारात सुद्धा चमकतात . पायामध्ये चांदीचे मोठे मोठे तोडे असतात . पुरुष शर्टाची वरची बटणे उघडे टाकतात आणि डोक्याला बारीक टापसे बांधलेले असते . अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असल्यामुळे आपल्याला सावधपणे चालावे लागते . 
प्रातिनिधिक चित्र
आज कधी नव्हे ते डांबरी रस्त्यावरून वेगाने धावण्याचा माझा विचार होता , तो या गाडीवान लोकांमुळे बारगळला आणि मी पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेच्या खडकाळ पट्टीवरून चालायला सुरुवात केली . सुदैवाने कालच नवीन चप्पल मिळाली असल्यामुळे पायाला खडे फारसे टोचत नव्हते . मैय्या प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करून तुम्हाला वस्तू देते पहा !
हे लोक जवळून जाताना नर्मदे हर म्हणण्याऐवजी जोरात किंचाळत जायचे !
सुदैवाने मला मध्ये काही शॉर्टकट मिळत गेले . ह्या गाड्यांची वर्दळ पुढे कुठे जाते आहे ते दिसत असल्यामुळे आधीच कळायचे की रस्त्याने जाण्यापेक्षा दरीतून उतरून जावे ! गंमत म्हणजे एकही गाडी उलटी येत नव्हती सर्व गाड्या ओंकारेश्वर कडेच चालल्या होत्या . दुपारनंतर ऊन वाढणार असल्यामुळे पहाटेचे थंड वातावरणातच  ताशी पाच सहा सात आठ किलोमीटर गतीने चालत अंतर तोडायचे असे मी ठरवले होते . आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो . वाटेत एकही परिक्रमावासी दिसला नाही . कारण सर्व परिक्रमावासी मिळेल त्या मार्गाने ,वाहनाने वगैरे ओंकारेश्वरला पोहोचले होते . गाडीवरून लिफ्ट मागून जाणारे देखील बरेच परिक्रमावासी मी पाहिले . बहुतांश परिक्रमावासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त करतात . परंतु तरीदेखील रस्त्याने चालताना एकही परिक्रमावासी भेटू नये हे मोठे आश्चर्यकारक होते .आपण रस्ता तर चुकलो नाही ना असे देखील वाटायचे ! दिवस जसा उगवू लागला तसतशी रस्त्यावरची वर्दळ कैकपटीने वाढली ! इतके लोक ओंकारेश्वरला जात असतील याची मला कल्पनाच नव्हती ! जवळपास प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील माणसे ओंकारेश्वरला निघाली होती ! मला खरे म्हणजे थोडीशी भूक लागली होती . परंतु सोबत खाण्याचे काहीच सामान नव्हते .इतक्यात मध्येच एक स्विफ्ट डिझायर गाडी माझ्या शेजारी थांबली . त्यामध्ये नगर जिल्ह्यातील गाडीने परिक्रमा करणारे परिक्रमा वासी होते . त्यांनी मला खजुराचे मोठे पाकीट दिले . त्यांचे आभार मानून चालता चालताच एक खजूर तोंडात टाकू लागलो . खजुरातून शरीराला जाळण्यासाठी तयार शर्करा मिळू लागली ! आणि त्याचा परिणाम वाढलेल्या गतीमध्ये दिसू लागला ! अटूट खास नावाचे गाव आले . इथे एकाने उसाचा रस पाजला . या संपूर्ण भागामध्ये मी प्रचंड शॉर्टकट घेतले . अतिशय निर्जन आणि निर्मनुष्य रस्त्यातून चाललो . इतका चाललो , इतका चाललो ,की थांबले तरी माझे पाय म्हणायचे चल चालू या ! कल्पना करून बघा लख्ख उजेड पडला होता तरी मी अजून एकदाही थांबलो नव्हतो . थांबले की काहीतरी गडबड झाल्यासारखे वाटायचे . आज मला कोणाला होकार नकार देण्याचा  विषयच नव्हता . सकाळी चहाला नाही म्हणालो म्हणून दुपारचे भोजन मिळाले नाही वगैरे भानगड आज नव्हती ! दिवसभर उपासच करायचा होता त्यामुळे न थांबता भराभर चालत राहिलो . वेगाने चालणे ही एक नशा आहे . ती एकदा लागली की थांबावेसे वाटत नाही . मध्ये अनेक लोक तुम्हाला सोडू का विचारत होते . परंतु मी काही त्यांच्या नादाला लागलो नाही . मध्ये अनेक कालवे , उपकालवे , शेते , जंगले लागली . सगळी तुडवत चालत राहिलो . माझा आजचा एकंदरीत मार्ग असा होता . भमोरी , जलवा बुजुर्ग , देवला , खुटला कला , डूडगांव ,अटूट खास , अटूट मोहना , नेमाचा , हरबंसपूर , गौईल , बकरगाव . बखरगाव पासून ओंकारेश्वर धरणातील पाणी उतरले असेल तर करोली , सातमात्रा , एखंड, भिलाया , ताराघाटी , बावडी या मार्गे ओंकारेश्वर ला पोहोचता येते . परंतु आजकाल पाणी उतरतच नसल्यामुळे बखर गाव पासून पुढील मार्ग असा होता नेतन गाव , मठेला , हथिया बाबा आश्रम , मासलाय , गुंजाली , लौंडी , पिपल्या , कपासी, अंजरुड , भोकारिया , धावडीया, गुंगरी , खिंड मार्गे ओंकारजी अशी गावे मध्ये लागणार होती . वरील गावांची यादी पाहून तुम्हाला मी न थांबता एकंदरीत किती चाललो असेन त्याचा अंदाज येईल . यापूर्वी तीन महिन्यांमध्ये परिक्रमा पूर्ण केलेले कोणी परिक्रमा वासी मला भेटले तर ते मला थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण वाटायचे . परंतु आज मी जे काही चाललो त्याच्यावरून मला अंदाज आला की एखादा हलकाफुलका मनुष्य ज्याला अन्नमयकोशाची फारशी पर्वा नाही , तो सहज ९० दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकतो ! त्याची मधली सर्व दर्शने होतील का नाही हे सांगता येत नाही .परंतु परिक्रमा पूर्ण नक्की होईल . मध्ये हरबन्सपूर गावाजवळ मला एक तमिळ माणूस भेटला . त्याच्या एकंदरीत चेहरेपट्टीवरून माझ्या लक्षात आले की हा तमिळ आहे . आणि तमिळ देवर समाजाचा मनुष्य आहे . मी त्याला " वणक्कम अण्णा " म्हटल्यावर तो एकदम चमकलाच ! त्याने मला विचारले की तुम्हाला कसे कळले मी तामिळ आहे ? नर्मदा मैया ची कृपा दुसरे काय ! मला हळूहळू असे लक्षात आले की आपले मन जर निर्विचार असेल तर मैया आपल्याला समोर येणाऱ्या संकटाची चाहूल देत असते किंवा समोर येणारा मनुष्य कसा आहे ते सांगत असते किंवा समोर आता काय होणार याची पूर्वसूचना देत असते . अशा गमती जमती करत चालत होतो . अखेरीस हाथिया बाबा चा आश्रम आला . नेतनगाव नावाच्या गावाच्या हद्दीत हा आश्रम होता . इथून पुढे सडक मार्गाने सनावद मार्गे ओंकारेश्वरला बहुतांश लोक जातात . परंतु हा फारच लांबचा मार्ग होता आणि आजच्या आज पोहोचण्यासाठी कठीण होता .वाटेत सर्वच ग्रामस्थांनी मला सांगितले होते की मधून जाणारा एक शॉर्टकट आहे . रस्ता जंगलाचा आहे .परंतु फार कठीण नाही सापडू शकेल .
हाथिया बाबा आश्रमामध्ये हाथिया बाबाचे दर्शन घेतले . हत्तीच्या सोंडेसारखा आकार असलेला एक पाषाण येथे स्थापित केलेला आहे . गणपतीचेच हे रूप आहे . आश्रमामध्ये खूप गर्दी होती . मी दर्शन घेऊन पाण्याचा कमांडलू टाकीवर भरून घेतला . इतक्यात आश्रमातील बाबाने मला खिचडी खाऊन जायला सांगितले . देवच पावला ! सकाळपासून ते खजूर सोडून पोटात काहीच नव्हते ! आणि अखंड चालतच होतो ! अंगातून अक्षरशः वाफा निघत होत्या . आता थंडी कमी होत आहे हे माझ्या लक्षात आले . त्यामुळे मी माझ्याकडे असलेली दोन ब्लॅंकेटस जी मला माझियाखार आदर्श धर्मशाळेत मिळाली होती व जी मी अतिशय स्वच्छ ठेवली होती आणि नुकतीच एका कालव्यामध्ये धुतली सुद्धा होती , ती साधूकडे सोपवू लागलो . इतक्यात आश्रमात स्वयंपाकाची सेवा करणाऱ्या एक माताजी आल्या आणि त्यांनी ती ब्लँकेटस मागून घेतली . ती दोन्ही ब्लॅंकेट गेल्यामुळे माझ्या पाठीवरचा प्रचंड भाला हलका झाला आहे असे मला वाटले ! दानामध्ये आनंद आहे , परंतु नर्मदा परिक्रमेदरम्यान दान करण्यात परमानंद आहे !
 नेतनगावचा हाथिया बाबा आश्रम
बोल हाथिया बाबा भगवान की जय !
या नळावर मी यथेच्छ पाणी प्यायलो आणि कमण्डलु भरून घेतला
या माताराम ना दोन ब्लँकेट सोपवली
 खिचडी पटापट भरून पुढचा मार्ग समजून घेतला आणि हाथिया बाबा आश्रम सोडला . साधूने सांगितले की शंकराची इच्छा असेल तर तू आज पोहोचशील . परंतु जंगलात रात्र झाली तर मात्र पुढे जायचे धाडस करू नकोस . सर्वांना नर्मदे हर केले आणि आश्रमा शेजारून वाहणाऱ्या कालव्याचा रस्ता पकडला . 
कालवा दुथडी भरून वाहत होता . त्यामधून नर्मदा जल वाहते आहे हे वासावरून माझ्या लक्षात आले . याचा अर्थ हा कालवा ओंकारेश्वर धरणापासून निघालेला होता . आणि याचा काठ जर मी धरला तर ओंकारेश्वर धरणापाशी पर्यायाने ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रापाशी पोहोचणार होतो . मार्ग अतिशय खडतर खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता . या मार्गावरून एकही परिक्रमावासी किंवा ग्रामस्थ कोणीही जात नव्हते . इथून पुढे गावे लहान व कमी आहेत त्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती . मुळात हा वहिवाटीचा रस्ताच नसून कालव्याच्या भोवती नैसर्गिकरित्या तयार झालेला पायवाट मार्ग होता . कालव्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता . याचा अर्थ ओंकारेश्वर पर्यंत मला अखंड चढ चढत जायचे होते . बरेच अंतर चाललो तरी कोणीही दिसेना . सकाळपासून सलग आठ नऊ तास मी अखंड चालत होतो . सूर्य डोक्यावर आग ओकत होता . त्यामुळे अंगाचा थरकाप होऊ लागला . संपूर्ण अंग भाजून त्यातून वाफा निघत आहेत असे वाटत होते . कालवा शेजारीच होता परंतु आत मध्ये उतरायला जागाच नव्हती . अतिशय धोकादायक उताराचा कालवा होता . इतक्यात एके ठिकाणी मला पाण्याचा पाईप कालव्यामध्ये सोडलेला दिसला . आजूबाजूला सावलीसाठी एकही झाड नसलेला हा कालवा होता परंतु त्या पाईप पाशी एका झाडाची सावली पण होती . सावलीमध्ये मी सामान ठेवले आणि पाईपला धरून हळूहळू कालव्यामध्ये उतरलो ! नर्मदा जलच ते ! त्याच्या स्पर्शाने इतका आनंद झाला म्हणून सांगू ! त्या कालव्यामध्ये मी खूप वेळ पोहलो ! अंगातील सर्व उष्णता निघून गेली . कालव्याच्या पाण्याला वेग असल्यामुळे आत मध्ये टाकलेल्या पाईपला धरून मी एखाद्या बांधलेल्या फडक्यासारखा पाण्यामध्ये फडकत राहायचो . अखेरीस ओंकारेश्वरला पोहोचणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे वरती आलो . पाण्याची मला भयंकर आवड आहे . परंतु वेळेचे गणित बसवणे आवश्यक होते . एक क्षणभर विचार आला की झाडाच्या सावलीत दोनच मिनिटे पडावे ! तत्क्षणी मी सामान उचलले आणि उघडाच चालायला लागलो !  कालच्या काळ झोपेच्या कुटुस्मृती चांगल्या लक्षात होत्या ! दोन मिनिट पडल्या पडल्या झोप लागणार आणि उद्या सकाळीच मी जागा होणार इतपत शरीर थकलेले होते ! पुढे उन्हातच ओले कपडे पिळून घातले आणि अंगावरच वाळले सुद्धा ! इथे एकही मनुष्य भेटत नसल्यामुळे मला पुढचा मार्ग कुठला आहे तेच कळेना . कालवा वळणे वळणे घेत चालला होता त्यामुळे याचा मार्ग शॉर्टकटचा नाही हे माझ्या लक्षात आले होते . परंतु असंख्य छोट्या मोठ्या पायवाटा असल्यामुळे नक्की कुठला मार्ग पकडावा कळत नव्हते . इतक्यात एका छोट्या मुलीची पावले धुळे मध्ये उठलेली मला दिसायला लागली . मी मनोमन असे ठरविले की ही नर्मदा मातेची पावले आहेत असे समजून चालूया . त्या पावलांचा मागोवा घेत घेत मी चालायला लागलो . ती इवलीशी पावले कालवा सोडून उजवीकडे वळली त्यामुळे मी देखील वळलो . पावले ताजी उठलेली होती . परंतु एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये अनवाणी पायाने कुठली छोटी मुलगी चालली असेल बरे ? आणि सोबत मोठ्या माणसाची पावले नव्हती . दोन-तीन किलोमीटर त्या पावलांचा मागवा घेतल्यावर मला पुढचे गाव लागले . आणि मग आता सर्व रस्ते गावे , शेती ,ओढे , नाले असेच लागले . हा सर्व आदिवासी वनवासी परिसर होता . आता मला ओंकारेश्वर मधून परत येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसायला लागली . या भागातील लोक चालतच ओंकारेश्वरला जातात . त्यामुळे मला मार्ग विचारायची गरज उरली नाही . लोक ज्या मार्गाने येत होते तोच माझा मार्ग होता . सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागला होता . आणि अजूनही मला ओंकारेश्वर चा ॐ सुद्धा दिसला नव्हता . मी पायांची गती वाढवली आणि एक शेवटचे गाव लागले . गावातल्या मुलांनी मला जंगलातून कसे जायचे तो रस्ता सांगितला . ग्रामस्थ या रस्त्याने येत नसत . परंतु काही धाडसी तरुण मुले या रस्त्याचा वापर करायची . मुलांनी सांगितलेला खाणाखुणा बरोबर पहात मी जंगलातला मार्ग पकडला . परंतु जंगलामध्ये नेहमीच जे होते तेच झाले आणि माझा मार्ग भटकला . आता परत फिरावे की पुढे जावे या विचारांमध्ये मी असताना नर्मदा मातेचा जोरात पुकारा केला . दूरवरून कोणीतरी मला आवाज दिला . त्या आवाजाच्या दिशेने जंगलामध्ये घुसलो . एक तरुण मनुष्य उलटा परत येत होता . त्याने मला अजूनच जवळचा मार्ग दाखवला . वाटेतल्या खाणाखुणा , कुठली झाडे , कुठले दगड , तसेच ओढे नाले आडवे येथील हे सर्व सांगितले . हे सर्व करताना सूर्यदेव मावळतीकडे वेगाने चालले आहेत हे पाहून एका उंच टेकडावर जाऊन मी थांबलो .हात जोडून सूर्याची प्रार्थना केली . हे सूर्य देवा ही माझी पहिली परिक्रमा आहे . आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ओंकारेश्वर ला पोहोचण्याचे माझे ध्येय आहे . तुझ्या सहकार्याशिवाय माझे ध्येय साध्य होणे अशक्य आहे . कृपा करून मी ओंकारेश्वरला पोहोचेपर्यंत गायब होऊ नकोस ! तुला नर्मदा मातेची शपथ आहे ! कारण पूर्वी अमरकंटकच्या जंगलात सूर्य मावळल्यावर जंगल कसे खायला उठते हे मी अनुभवलेले होते .तसाच अनुभव मला पुन्हा इथे घ्यायचा नव्हता . अतिशय वेगाने मी जंगलातील तीन चार टेकड्या पार केल्या . साधारण मावळतीला आलेला सूर्य खूप झपाझप खाली जातो असा माझा रोजचा अनुभव होता . शेजारी तुलनेसाठी एखादी वस्तू किंवा झाड असेल तर तुम्हाला त्याची गती सुद्धा पाहता येते इतकी ती वेगवान असते . परंतु आज मला एक चमत्कारिक अनुभव आला ! बराच वेळ सूर्यदेव एकाच उंची वरती तळपत आहेत की काय असे मला वाटत होते ! तीन टेकड्या पार करूनही पुन्हा चौथी मोठी टेकडी समोर पाहिल्यावर माझा संयम सुटला . सर्वत्र घनघोर जंगल . पाऊलवाटांचा पत्ता नाही . कुठे बाण किंवा खुणा केलेल्या नाहीत . आणि मुख्य म्हणजे परत येणारे ग्रामस्थ दिसत नाहीत . आपण नक्की रस्ता चुकलो आहोत असे मला वाटले . मला वाटेल त्या दिशेला मी वेगाने धावत सुटलो . एका दमात टेकडी चढू लागलो . हळूहळू टेकडीचे रूपांतर एका खिंडी वजा पायवाटेत झाले . मी सूर्य देवाकडे सतत लक्ष ठेवून होतो . बघता बघता अचानक त्याने गती घेतली आणि झरझर झर झर गतीने तो मावळला ! जंगलातील ती भयाण शांतता , मावळणारा सूर्य आणि समोरची ती खिंड पाहून मला वाटले की आता खेळ संपला ! सूर्य मावळला आणि मी ६० किलोमीटर चालून खिंडीच्या सर्वोच्च टोकावर पोहोचलो . अचानक समोरून प्रचंड कोलाहल , दंगा , आरडाओरडा , संगीत ऐकू येऊ लागले !प्रचंड झगमगाटात नटलेले सजलेले ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र , हे काय इथे माझ्यासमोरच तर होते ! 

ती खिंड चढेपर्यंत ओंकारेश्वर चा मागमूस सुद्धा लागत नाही ! आणि ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र अतिशय गजबजलेले असल्यामुळे अचानक तो झगमगाट दिसू लागतो आणि यात्रेच्या गोंगाटाचा आवाज ऐकू येऊ लागतो ! उजव्या हाताला प्रचंड ओंकारेश्वर बांध आणि त्याच्या पलीकडे चमकणारे नर्मदा जळ दिसले ! ओंकारेश्वरा चे आणि अमलेश्वराचे विद्युत रोषणाईने उजळलेले कळस दिसले ! दिवस मावळत होता . रात्र अजून व्हायची होती . ती रात्र साधी नव्हती ! ती होती महाशिवरात्री ! डोळयातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या ! मोठ्या आवाजात पुकारा केला नर्मदेsss हर ! ओम नमः पार्वती पते हर हर महादेव !  


लेखांक सदुसष्ठ समाप्त (क्रमशः )

लेखांक ६८ : श्री क्षेत्र ओंकारेश्वर , श्री क्षेत्र अमलेश्वर , ओंकारमांधात पर्वत

ओंकारेश्वर . . . नर्मदा परिक्रमा हा विषय निघाला की ओघाने सर्वांच्या मुखात येणारे पहिले नाव म्हणजे ओंकारेश्वर ! काय आहे या स्थानात ?का एवढा जयजयकार ओंकारेश्वराचा ? हे खरं म्हणजे तिथे प्रत्यक्ष येऊनच अनुभवायला पाहिजे . मी ओंकारेश्वर क्षेत्राचे प्रथम दर्शन नर्मदा परिक्रमेदरम्यानच घेतले . त्यापूर्वी हा सुयोग कधी आला नव्हता . परंतु परिक्रमे नंतर मात्र पुन्हा पुन्हा ओंकारेश्वर बोलावून घेतो ! आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून तुलनेने सर्वात जवळचे व गाडी लोहमार्ग सर्वचप्रकारे सोयीचे ,पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ओंकारेश्वरच आहे .  
उजव्या हाताला दिसणाऱ्या ओंकार मान्धात पर्वतावर जाणारा पादचारी पुल

या ओंकारेश्वराचा महिमा अपरंपार आहे .प्रत्येक परिक्रमावासी त्याच्या परिक्रमेदरम्यान दररोज ज्या नर्मदा जलाच्या शिशीची पूजा करतो त्यातील सर्व नर्मदा जल हे परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वराच्या पिंडीवर अर्पण करावयाचे असते ! थोडक्यात काय तर ओंकारेश्वराला चढविण्यासाठी तीर्थ यात्रा करून त्या जलाची तीर्थ शुद्धी करण्याची प्रक्रिया म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे . इतके या स्थानाचे महात्म्य आहे . ओंकारेश्वर या स्थानाच्या महात्म्याबद्दल यापूर्वी देखील अनेकांनी अनेक ठिकाणी लिहिलेले आहे . त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा मी माझ्या डोळ्यांना हे तीर्थक्षेत्र कसे भासले ते तुम्हाला सांगणार आहे .  त्या खिंडीमध्ये उभा राहून जेव्हा मी ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राकडे पाहिले तेव्हा मला अक्षरशः मी भूलोकीचे वैकुंठ पाहत आहे असा भास झाला ! इतकी सकारात्मक स्पंदने यापूर्वी मी कुठेच अनुभवली नव्हती ! आणि केवळ एका मंदिरातून किंवा एका ठिकाणावरून ही स्पंदने येत नव्हती तर या तीर्थक्षेत्राच्या कणाकणातून ती स्पंदने पाझरत होती ! एका जबरदस्त ऊर्जेने आणि आध्यात्मिक शक्तीने हा परिसर भारलेला आहे हे लगेच लक्षात येत होते . इथे पाऊल ठेवताना प्रत्येक पावलाला अंगामध्ये शहारे उमटत होते . मनाची अवस्था उन्मनी झाली होती . आनंदातिशयाच्या लहरींनी शरीर भारीत झाले होते ! डोळ्यातून अखंड आनंदाश्रू वाहत होते ! तीर्थ महात्म्य , स्थान महात्म्य ते याहून वेगळे काय असू शकते ! मी सकाळपासून केलेले सर्व कष्ट क्षणात विसरून गेलो होतो . नर्मदा नदी केवळ तिच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश करते असे म्हणतात त्याची याची देही याची डोळा अनुभूती मी तिथे घेतली .
उजवीकडे पर्वतावर दिसणारा दगडी कळस म्हणजे ओंकारेश्वराचे मंदिर आहे
मुळात ओंकारेश्वर तीर्थ कसे आहे याचे थोडक्यात वर्णन करून तुम्हाला सांगतो . नर्मदा नदी कधी माती कापत वाहते तर कधी दगड चिरत वाहते . ओंकारेश्वर च्या संपूर्ण परिसरामध्ये मोठे मोठे पहाड आहेत . उत्तर तटावर विंध्यगिरी आहे तर दक्षिण तटावर सातपुडा पर्वत आहे . या दोन्ही पर्वतांची भेट ज्या खचदरीमध्ये होते त्या खचदरी मधून नर्मदा वाहत आहे . या ठिकाणी ओंकारेश्वर नावाचेच धरण बांधण्यात आले असल्यामुळे नर्मदेतील अनेक पवित्र तीर्थस्थाने बुडाली आहेत .
 यातील सर्वात पवित्र असे धावडीकुंड किंवा धाराजी आता जलमग्न झाले असून ओंकारेश्वर धरणाच्या खाली शंभर दोनशे फुटावर आता ते आहे . पूर्वी याच ठिकाणी अप्रतिम अशी शिवलिंगे निर्माण आणि प्राप्त व्हायची . धरणातून पाण्याचा प्रवाह नियंत्रित केलेला असल्यामुळे ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राच्या आजूबाजूला असलेले पाणी कमी जास्त होत राहते . धरण संपल्या संपल्या लगेचच चार पाचशे मीटर अंतरावर नर्मदेच्या दोन शाखा होतात . या दोन्ही शाखा एका पर्वताला वळसा मारून पुढे पुन्हा एकत्र येतात . 
ओंकार मांधात पर्वताच्या अखेरीस होणारा कावेरी नर्मदा संगम

हा पर्वत म्हणजेच ओंकार मांधात पर्वत . आणि या पर्वतावरील जे महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेच ओंकारेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे .
हा पर्वत ॐ आकाराचा आहे अशी मान्यता आहे
 या डोंगरावर परिक्रमा सुरू असलेले परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . परंतु शेवटी ओंकारेश्वरालाच जल चढवायचे असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये ९०% परिक्रमावासी ओंकारेश्वर क्षेत्रावरूनच परिक्रमा उचलतात . अशी परिक्रमा सुरू करण्यापूर्वी मात्र ते ओंकारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतात . ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन ओंकार मांधात पर्वताची एक छोटीशी परिक्रमा आहे ती पूर्ण करून नर्मदेच्या किनाऱ्यावर यायचे आणि मग परिक्रमा सुरू करायची असा परिपाठ आहे . 

यानंतर मात्र बेटावर जाता येत नाही . याच नव्हे तर नर्मदेमध्ये असलेल्या असंख्य बेटांवर परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . मी देखील परिक्रमे मध्ये असल्यामुळे मांधात पर्वत नाही पाहू शकलो . इथे दक्षिण तटावर अजून एक पौराणिक शिवालय आहे ज्याचे नाव अमलेश्वर आहे . काही साधूंच्या मते हेच खरे ज्योतिर्लिंग आहे . 
 श्री अमलेश्वर ( ममलेश्वर ) मंदिर
बारा ज्योतिर्लिंगांची नावे सांगणारा जो श्लोक आपल्याकडे म्हटला जातो त्यात ओंकारममलेश्वरम् असे म्हटलेले आहे . त्याची फोड ओंकारम् + अमलेश्वरम् अशी आहे . परंतु याच श्लोकांमुळे बहुतांश लोक या देवाला ममलेश्वर असे देखील म्हणतात . यातील ओंकार हे पर्वताचे नाव आणि अमलेश्वर हे महादेवाचे नाव आहे असे साधू लोक मानतात . सनातनी हिंदू लोक मध्यम मार्ग काढण्यात पटाईत आहेत त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी येणारे सर्व लोक दोन्हीही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन मोकळे होतात ! त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगातील एखादे ज्योतिर्लिंग राहिले असे होत नाही ! 
 श्री अमलेश्वर (अर्थात सर्व प्रकारच्या मळाचा नाश करणारा ईश्वर )
परिक्रमावासी ममलेश्वराचे किंवा अमलेश्वराचे दर्शन अवश्य घेऊ शकतात . फक्त इथे एका गोमुखातून नर्मदेची गुप्त धारा प्रकट झालेली आहे . तिचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी लागते . त्यामुळे काही परिक्रमावासी ज्यांना या परिसराची माहिती नाही ते अमलेश्वराचे दर्शन न घेताच पुढे जातात .  या पर्वतावर जाण्यासाठी एक झुलता पूल आहे शेकडो नावा आहेत आणि आता एका नवीन गाडी पुलाची निर्मिती चालू आहे . वेगाने धावणाऱ्या नावा हे या भागाचे वैशिष्ट्य आहे .
भक्तांचे ने आणि करणाऱ्या शेकडो यांत्रिक नावा
इथे पाण्याखाली खडक असल्यामुळे नाव चालवणे खूप धोक्याचे व कठीण काम आहे
ओंकारेश्वराचे मंदिर व नर्मदा मैय्या
हेच ते गोमुख ज्याच्या आजूबाजूला परिक्रमावासींना जाता येत नाही .
ओंकारेश्वर चे मंदिर आणि नर्मदा मैया
दोन्ही तटावरील खडक फोडत वाहणारी नर्मदा माता
 ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र एकदा पाहिले की लक्षात राहणारे आहे . या क्षेत्रामध्ये इतकी धामधूम असते परंतु आजूबाजूला चहुबाजूने अतिशय घनदाट जंगल असून येथे वाघ बिबट्या इत्यादी हिंस्र प्राण्यांचा अगदी मुक्त वावर आहे . केवळ हे तीर्थक्षेत्र सोडले तर आजूबाजूला मानवी वस्ती जवळपास शून्य आहे . वर्षभर इथे पर्यटकांची आणि भाविकांची प्रचंड गर्दी असते . लाखोंच्या संख्येने परिक्रमावासी इथे येऊन परिक्रमा सुरू करतात . नर्मदा मातेला या सर्वांची काळजी घ्यावी लागते . यातील तिच्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतात त्यांची परिक्रमा ती पूर्ण करते . बाकीचे काही ना काही कारणाने घरी निघून जातात .ज्याला शुद्ध मराठीमध्ये 'ड्रॉप आउट ' म्हणतात अशा 'ड्रॉपआऊटस् ' ची संख्या परिक्रम मध्ये खूपच जास्त आहे ! मागे एका लेखात मी सांगितले आहे ती आकडेवारी पुन्हा सांगतो . ओंकारेश्वर मध्ये काही मोठे मोठे मठ आहेत जे तुम्हाला परिक्रमा सुरू करण्यासाठी प्रशस्तीपत्रक देतात . हे मठ समन्वयाने दरवर्षी किती लोकांनी परिक्रमा उचलली याचा आढावा मांडतात . मी ज्या २०२२ सालामध्ये नर्मदा परिक्रमा उचलली होती त्यावर्षी एकूण आठ लाख साठ हजार लोकांनी परिक्रमा उचलली .याच्यामध्ये बसने जाणारे ,गाडीने जाणारे , सायकलने जाणारे ,पायी जाणारे ,दंडवत घालत जाणारे असे सर्व प्रकारचे परिक्रमा वासी आले . यातील पायी चालणाऱ्या परिक्रमावासींची संख्या दोन लाख साठ हजार होती . यापैकी सुमारे १२ ,००० लोकांची परिक्रमा पूर्ण झाली असे चौकशी अंती मला कळाले .
या आकडेवारीवरून तुम्हाला नर्मदा परिक्रमेच्या काठिण्य पातळीची कल्पना येईल . परंतु मी हा ब्लॉग पेपर फोडण्यासाठीच लिहिलेला आहे असे समजा !
नर्मदा परिक्रमा आपल्याला वाटते तितकी अवघड अजिबातच नाही . संपूर्णपणे नर्मदा मातेवर भार घातल्यावर परिक्रमेसारखे सोपे काहीही नाही ! जोपर्यंत मूल स्वतः धडपडत जिना चढायचा प्रयत्न करते तोपर्यंत त्याचे हात पाय लटपटत असतात ! त्याने आईला फक्त एक हात मारावी की आई कुठून तरी धावत येते आणि त्याला कडेवर घेऊन धावतच जिना चढते ! तसे हे सर्व आहे . माकडाचे पिल्लू असते त्याचा स्वतःवर फार विश्वास असतो त्यामुळे ते स्वतः आईला धरून बसते . त्यामुळे त्याची आई त्याला सोडून निवांत उड्या मारत असते . आता आईला घट्ट धरून ठेवायचे काम त्या पिलाचे असते . त्याची ताकद कमी पडली की तो सटकला ! याउलट मांजरीचे पिल्लू आई पुढे अनन्य असते . त्यामुळे हातपाय सोडून दिलेल्या त्या पिलाला आईच मानेला धरून उचलते आणि इकडून तिकडे नेते . तिथे पिलाला काहीच करावे लागत नाही . नर्मदा परिक्रमा असे मांजरीचे पिल्लू बनून करावी . कारण माकडाचे पिल्लू बनायचे असेल तर नर्मदा मैया खूपच जास्ती आणि मोठ मोठ्या अवघड उड्या मारणारी आई आहे हे लक्षात ठेवावे ! असो .
डोंगराचा उतार उतरून मी एका कालव्यापाशी आलो . छोट्याश्या पुलावरून कालवा ओलांडला आणि गावामध्ये शिरलो . इथे कुठला आश्रम आहे किंवा कुठला आश्रम नर्मदेच्या काठावर आहे याबाबतीत मला काहीच माहिती नव्हते . गावामध्ये अक्षरशः शेकडो आश्रम आहेत . चालत चालत मी एका मुख्य रस्त्यावर आलो आणि एका मोठ्या स्वागत कमानीने माझे लक्ष वेधले . शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या संस्थानतर्फे चालविला जाणारा एक अतिशय भव्य दिव्य आश्रम येथे आहे . नर्मदा परिक्रमेतील आश्रम कसा असावा ? तर तो गजानन महाराज आश्रमासारखा असावा ! हे तुम्हाला शंभर मधील ९५ परिक्रमा वासी सांगतील ! कुठल्याही प्रकारची असुविधा गैरसोय होऊ नये याची परिपूर्ण काळजी इथले सेवाभावी स्वयंसेवक घेतात . शेगाव संस्थान मध्ये ज्याप्रमाणे पांढरे शुभ्र स्वच्छ कपडे घातलेले सेवाधारी असतात अगदी तसेच सेवाधारी जे बहुतांश महाराष्ट्रातून आलेले असतात ते इथे सेवेसाठी असतात त्यामुळे आपल्याला खूप आपुलकीने सर्व सेवा दिली जाते . गेल्या गेल्या सुरक्षारक्षक आपले स्वागत करतात . आश्रमामध्ये मुक्काम करायचा असल्यास कार्यालयाच्या दिशेने आपल्याला पाठविले जाते आणि तुमच्या सोबत एक माणूस येतो . इथले व्यवस्थापक अतिशय आस्थेने तुमची चौकशी करतात आणि सर्व सामान खाली ठेवायला सांगतात . नोंदणी प्रक्रियेला वेळ लागणार असून तेवढा तुम्ही कृपा करून द्यावा अशी विनंती केली जाते . त्यानंतर तुमचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तपासले जाते . प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असेल तर आणि तरच या आश्रमामध्ये राहता येते अन्यथा राहता येत नाही ! संपूर्ण परिक्रमेमध्ये आधार कार्डाची सक्ती करणारा एवढा एकच आश्रम मी पाहिला . त्यानंतर तुम्हाला परिक्रमावासींसाठी बांधलेल्या मोठ्या सभागृहांमध्ये पाठविले जाते . कुठल्या क्रमांकाच्या सभागृहात तुम्ही उतरावे हे तुम्हाला आधीच सांगितले जाते आणि तिथपर्यंत सोडण्यासाठी एक सेवेकरी तुमच्या सोबत येतो . अशा पद्धतीने मी सभागृह क्रमांक दोन मध्ये शिरलो आणि आतून सर्व परिक्रमावासिनी एकच जल्लोष केला ! कारण गेल्या ५० दिवसांमध्ये मला जेवढे म्हणून परिक्रमावासी भेटले होते जवळपास ते सर्वजण आत मध्ये थांबलेले होते ! प्रत्येकाकडे फोन असल्यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात राहायचे .परंतु माझा ठाव ठिकाणा एक नर्मदा मैया सोडली तर कोणालाच माहिती नव्हता ! त्यामुळे मी आलो आहे हे पाहिल्याबरोबर सर्वांनी एकच गलका केला ! मला उगाचच सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटू लागले ! परंतु नंतर लक्षात आले की आत मध्ये येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासी चे स्वागत थोड्याफार फरकाने असेच होते आहे ! या सर्वांची परिक्रमा संपलेली होती त्यामुळे हा आनंद स्वाभाविक होता . परंतु माझा मात्र हा साधारण मध्यबिंदू आलेला होता . अजून इतकेच मला चालायचे होते . परंतु तरीदेखील या सर्वांच्या आनंदात मी तेवढ्याच किंबहुना दुपटीने ऊर्जा देत सहभागी झालो !
शेगावचे श्री गजानन महाराज आश्रम ओंकारेश्वर
आश्रमाचे भव्य दिव्य प्रवेशद्वार
आश्रम परिसर
परमपूज्य श्री गजानन महाराज शेगाव यांचे मंदिर
आश्रमातील सुसज्ज व प्रशस्त भोजन कक्ष
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर . या एका विरक्त व कर्तबगार साध्वी मुळे आज आपल्या देशातला धर्म टिकून आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . आज आपण पाहतो की बहुतांश सर्व मंदिरे एकट्या अहिल्याबाईंनी  जीर्णोद्धारित केलेली आहेत .
हा आश्रम म्हणजे भूलोकीचा स्वर्गच आहे जणू
भक्तगणांची निवास व्यवस्था . परिक्रमावासींसाठी मोकळी सभागृहे आहेत .
श्री गजानन महाराजांच्या पोथी मध्ये येणारा नौका बुडताना नर्मदा मातेने वाचवली ,असा प्रसंग याच ठिकाणी घडलेला आहे .
 वाटेत बऱ्याच जणांचे संपर्क क्रमांक लिहून घ्यायचे राहिले होते . ते काम या मुक्कामामध्ये मी पूर्ण करून घेतले . प्रचंड दमलेला असल्यामुळे इथे दोन दिवस राहावे असे मी ठरविले . इथे तुम्हाला दोन दिवस मोफत राहता येते . त्यानंतर देवस्थानची परवानगी घेऊन तुमचा मुक्काम वाढविता येतो . इथली प्रत्येक बाबतीत असलेली शिस्त मला अतिशय भावली . इतके मोठे संस्थान असून जरा देखील गडबड गोंधळ कुठेही नाही ! काय जबरदस्त रचना आहे ! वा ! नर्मदे हर ! जय गजानन ! गणी गण गणात बोते ! 
इथे माझ्या आधीच दोन्ही बंगाली पोहोचले होते . आणि अजूनही काही बंगाली परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण झाल्यामुळे तिथे पोहोचले होते त्यांच्यासोबत राहिले होते . याच्यामध्ये प्रामुख्याने मनोज दत्ता नावाचा आरामबाग हुगळी पश्चिम बंगाल येथे राहणारा एक परिक्रमा वासी होता .खूप हुशार होता .याने मला नको नको म्हणताना एक हॅट दिली . परिक्रमे मध्ये हॅट वगैरे घालायचे नसते असे मी त्याला सांगितल्यावर त्याने  सांगितले की आता इथून पुढे कडक उन्हाळा चालू होणार आहे त्यामुळे कान झाकणे अतिशय आवश्यक आहे . थंडीमध्ये फेटा बांधला ते ठीक आहे परंतु आता तुला टोपी घालावीच लागेल . त्याच्याशी जास्ती चर्चा न करता मी ती टोपी सामानामध्ये ठेवून दिली . पुढे योग्य वेळी कुणाला तरी देऊन टाकू असे ठरविले . सारंग देव पोहोचला होता . रोकडे काका ,शेळके काका आणि त्यांची संपूर्ण गँग पोचली होती . जळगावचे पाटील साहेब आणि पाटील काकू पोहोचल्या होत्या . जिकडे नजर मारावी तिकडे सगळे ओळखीचे लोक भेटत होते ! आपल्या दररोजच्या जीवनातल्या नमस्कार चमत्कार वाल्या औपचारिक भेटी वेगळ्या . आणि नर्मदे काठी खडतर मार्गक्रमणा करताना झालेल्या हृद्य भेटी निराळ्या ! या भेटीमधली मजाच काही और आहे ! हे जिवाभावाचे लोक खरोखरीच आपले आत्मीय मित्र होतात असा अनुभव मी पुढे घेतला . 
इथे प्रामुख्याने मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो . तुम्हाला मागे मी रामनगर महालापाशी मला भेटलेला साधू आणि नंदाताई पावशे या परिक्रमावस्यांची हकीकत सांगितली . नंदाताईंना एकटे सोडून सर्व लोक पुढे निघून गेल्यामुळे एकट्याच रडतखडत चाललेल्या या बाईंना सोबत म्हणून महात्यागी रामकरण दास जी नावाचा साधू त्यांच्यासोबत संपूर्ण परिक्रमा चालला . हे दोघेही इथे आत मध्ये आले ! मी साधना नमस्कार केला . व आता दोन दिवस मुक्काम करा असे सांगितले . साधू मला म्हणाले की माझ्याकडे आधार कार्ड नाही आणि इथे आधार कार्ड ठेवून घेत नाहीत . माझे काम होते या माऊलीला इथपर्यंत सुरक्षित आणून पोहोचवणे . आता माझे काम संपले . असे म्हणून झप झप चालत तो साधू बाहेर पडला . मी देखील त्यांच्या मागे वेगाने बाहेर पडलो . परंतु एवढे मोठे आश्रमाचे आवार असून देखील तो साधू मला कुठेही दिसला नाही ! मी सुरक्षारक्षकांना देखील विचारले . सगळीकडे पाहून आलो परंतु ते साधू अदृश्य झाले हे मी स्वतः अनुभवले ! धावतच आत मध्ये येऊन मी नंदाताईंना हा प्रकार सांगितला . त्यांनी साधूंच्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला . हा क्रमांक अस्तित्वात नाही असा संदेश त्यांना ऐकू येऊ लागला ! नंदाताई व मी दोघेही दिङमूढ झालो . कारण या साधू सोबत थोडा तरी वेळ घालवायचे भाग्य मला मिळाले होते . आणि नंदाताई तर अखंड या साधू सोबत सुमारे दोन महिने चालत होत्या . तो कोण होता ,काय होता काहीही कळायला मार्ग नाही . महा त्यागी होता खरा ! नर्मदा खंड अशा महापुरुषांनी भरलेला आहे ! इथे अजून एक चित्रपटातील हिरो शोभावा असा तरुण परिक्रमा वासी दिसला . प्रत्यक्षात परिक्रमा झाल्यावर लोक दाढी मिशा केस काढून टाकतात आणि ब्रह्मचर्याचे , तप:साधनेचे तेज चेहऱ्यावर आलेले असते . त्यामुळे असे लोक खूप तेजस्वी दिसू लागतात . सर्वत्र आता असे चमन गोटे दिसू लागले ! 
गजानन महाराज मठ ओंकारेश्वर येथे भेटलेले एक सह परिक्रमा वासी . असे दाढी मिशा काढलेले परिक्रमा वासी समोर आले , की दाढी मिशांमध्ये त्यांना बघायची सवय असल्यामुळे हे नक्की कोण आहेत ते ओळखूच यायचे नाही ! परंतु हे लोक मात्र मला लगेच ओळखायचे . अशी मजा खूप वेळा झाली .
हा तेजस्वी तरुण मुंबईला वकिली करत असे . विधीज्ञ चेतन बावकर दहिसर असे त्याचे नाव होते . याच्याशी देखील गप्पा मारल्या . त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे विधीज्ञ धनंजय लोणकर म्हणून भांबुर्डा पुणे येथे राहणारे एक वकील भेटले . यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची देहबोली आवाज आणि बोलण्याची पद्धत तंतोतंत भिडे गुरुजीं सारखी होती . त्यांना मी त्यांच्या मोबाईलवर गुरुजींचे काही व्हिडिओ दाखवले आणि त्यांनी देखील मान्य केले की दोघांच्या बोलण्यामध्ये साम्य आहे खरे ! यांची परिक्रमा अर्ध्याच्या वर पायी पूर्ण झाली परंतु नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी गाडीने पूर्ण केली . इथे भेटलेले अजून एक परिक्रमावासी म्हणजे राजू सोनार किंवा राजू टेलर जे शूलपाणीश्वराच्या झाडीमध्ये असलेल्या धडगाव या महाराष्ट्राच्या गावामध्ये राहतात . त्यांनी त्यांचा क्रमांक दिला आणि शूल पाणी मधून जाताना नक्की संपर्क साधायची सूचना केली . सर्वच परिक्रमावासी मोठ्या आनंदामध्ये होते ! आणि माझी परिक्रमा संपल्यावर साधारण माझी अवस्था कशी होणार आहे त्याची झलक मला इथे पाहायला मिळत होती ! यानंतर देवेंद्र सारंग उर्फ सारंग देव याने मला सांगितले की आता मी तुला संपूर्ण ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणतो . आणि त्याप्रमाणे त्याने मला क्रमाक्रमाने एकेक मंदिरे फिरविली . आधीच सांगितल्याप्रमाणे इथे परिक्रमा खंडित होणारे काही क्षेत्र आहेत ती टाळून त्याने बरोबर मला अमलेश्वर आणि अन्य अनेक महत्त्वाची दर्शने घडविली . यानंतर आम्ही दोघे नर्मदा मैया च्या काठावर जाऊन बसलो . मी स्नान करून घेतले . अंधार पडला होता . प्रचंड मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंची गर्दी होती कारण आज महाशिवरात्री होती . इथे धरणाचे भोंगे वाजले की थोड्या वेळाने जल विद्युत निर्मिती प्रकल्पातून पाणी सोडले जाते . त्यामुळे बघता बघता आपल्या डोळ्यासमोर नर्मदा जलाची पातळी पाच फूट ते दहा फुटापर्यंत वाढते . तीन वेळा भोंगा वाजला की पाणी येते . हा प्रकार मला पाहायचा होता परंतु ती इच्छा मैयाने नंतर पूर्ण केली . इथे बसून आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या . सारंगला परिक्रमेचे पुस्तक हवे होते . ते जिथे मिळते त्या तिलकवाडा गावात गेल्यावर तुला तुझ्या पत्त्यावर पाठवायची व्यवस्था करतो असा शब्द मी त्याला दिला . प्रभादेवीला राहणारा हा तरुण अतिशय हुशार अभ्यासू आणि सात्विक होता .संपूर्ण परिक्रमेचे याने अतिशय सुरेख फोटो काढले आहेत . भविष्यात योग्य वेळ आली की सर्व फोटो तुला देतो असे त्याने मला सांगितले . हा देखील बऱ्यापैकी मी आलो त्याच मार्गाने आलेला असल्यामुळे याचे फोटो पाहिल्यावर मला ती सर्व ठिकाणे आठवू लागली . यापैकी ज्या ज्या लोकांचे संपर्क होऊ शकतील त्या सर्वांना संपर्क साधून त्यांची परिक्रमेतील छायाचित्रे येथे टाकण्याचा प्रयत्न मी अवश्य करेन .  आश्रमामध्ये परिक्रमावासींना मोफत भोजन आहे . बाकीच्या यात्रेकरूंसाठी निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था सशुल्क आहे . गजानन महाराज आश्रमामध्ये अतिशय सुंदर बगीचा केलेला आहे . अतिशय सुंदर असे बहुमजली स्वच्छ संडास बाथरूम असल्यामुळे मी माझे कपडे मस्तपैकी धुवून घेतले . इथे त्यांनी परिक्रमावासींना नवीन वस्त्र देण्याची प्रथा सुरू केलेली आहे . वस्त्र म्हणजे एक सुती तलम कापडाची अप्रतिम लुंगी आणि तितक्याच उत्कृष्ट दर्जाच्या खादीचा एक पांढरा हाफ शर्ट देतात .तसे एक जोडी वस्त्र मला देखील मिळाले .यातील कॉलर असलेला  शर्ट काही मी घालणार नसल्यामुळे लगेच एका परिक्रमा वासीला देऊन टाकला . छाटी वस्त्र मात्र मी जपून ठेवले व पुढे योग्य वेळी एका साधूला देऊन टाकले . माझी सध्याची वस्त्रे अजून पुरेशी फाटलेली नव्हती . इथे माझी ओळख अजून एका महापुरुषाशी झाली . म्हणजे हे मला भेटू शकतील याचे सुतोवाच ब्रिजेश बिश्नोई याने आधीच करून ठेवले होते . कारण हे दरवर्षी महाशिवरात्रीच्या आसपास परिक्रमा संपवून येणाऱ्या परिक्रमावासींना काय काय शारीरिक त्रास होतो आहे हे पाहून त्यानुसार त्यांच्यावर मोफत उपचार करतात . यावेळेस ते स्वतः संपूर्ण पायी परिक्रमा करून आले होते हे विशेष .यांचे नाव होते डॉक्टर मोरे गुरुजी . हे नगरचे होते . हे स्वतः उत्कृष्ट हाडवैद्य असून तिथे उपस्थित प्रत्येक परिक्रमावासीला जागेवर जाऊन काय होते आहे ते पाहून परिक्रमेमुळे अवघडलेली त्यांची पाठ , पाय , हात , सांधे इत्यादी ते पूर्ववत करून द्यायचे . अलीकडे चिरोपाथी / कायरोप्रॅक्टी नावाचे एक नवीन शास्त्र लोकांना माहिती झाले आहे . आपल्याकडे हे अतिशय जुने असून हे जाणणाऱ्या लोकांना हाड वैद्य असे म्हणतात . घोड्यावरून पडल्यामुळे माझ्या उजव्या हाताचे फिफ्थ मेटाकार्पल हे हाड कामातून गेले होते . त्यात उजव्या हातामध्ये दंड कमंडलू पकडल्यामुळे ते अजूनच वाकडे झाले होते . यांनी मला ते बऱ्यापैकी जुळवून दिले . रात्री सुद्धा झोपून न जाता ते सर्व परिक्रमावस्यांच्या पायाला तेल लावून मालिश करून द्यायचे . मी उभ्या आयुष्यात कधीही कोणाकडूनही अंगाला मालिश वगैरे करून घेतलेली नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला . परंतु तरीदेखील मी झोपल्यावर त्यांनी पायाला तेल लावलेच असे मला शेजारच्या काही परिक्रमावासींनी सांगितले . त्या रात्री मी वेळेमध्ये जाऊन भोजन घेतले . अनेक नवीन नवीन परिक्रमावासींशी परिचय झाला . बऱ्याच लोकांना घेण्यासाठी त्यांचे घरातील मंडळी देखील आले होते . त्या सर्वांशी देखील गप्पा मारल्या . इथे भोजन सेवा देणारा सर्व कर्मचारी / सेवेकरी वृंद मराठी असल्यामुळे आम्हा मराठी परिक्रमावासींना विशेष आस्थेने आग्रहपूर्वक वाढायचा . तेथील सर्वांशी माझी चांगली गट्टी जमली . दुसऱ्या दिवशी बहुतेक परिक्रमावासी दर्शनासाठी उज्जैनला निघून गेले . परिक्रमावासींना उज्जैन किंवा ओंकारेश्वर या दोन्ही ठिकाणी रांगेमध्ये थांबावे लागत नाही तर थेट दर्शनाचा लाभ मिळतो . त्यामुळे मी थोडीशी पाठ टेकावी असा विचार करून जे सकाळी झोपलो , ते थेट रात्री साडेअकरा वाजता उठलो ! जेवणाची वेळ साडेदहा वाजता संपलेली होती . दुपारचे जेवण देखील बुडाले आणि रात्रीचे जेवण तरी मिळावे म्हणून मी धावतच गेलो . सर्व यंत्रणा बंद झाली होती व सेवेकरी आपापसात उरलेले अन्न जेवायला वाढून घेत होते . मी अतिश्रमामुळे दिवसभर झोपून राहिलो होतो आणि दुपारी सुद्धा जेवलो नाही हे सांगितल्यावर मात्र त्यांनी कुठल्याही नियमावर बोट न ठेवता त्यांच्यासोबत मला जेवायला घेतले आणि अतिशय आनंदाने शिरापुरी भात आमटी वगैरे पोटभर खाऊ घातले ! नर्मदा मैया परिक्रमा वाशीला उपाशी ठेवत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! दिवसभर मिळालेली अप्रतिम विश्रांती आणि रात्री मिळालेला पोटभर भोजन प्रसाद यामुळे माझ्या शरीराची गेले तीन दिवस झालेली सर्व झीज भरून निघाली . दरम्यान नर्मदा परिक्रमेचे नियमामध्ये बसत नसूनही माझ्यासोबत काही काळ चाललेले दोघे बंगाली बंधू ओंकारेश्वर दर्शन आणि ओंकार मांधात पर्वताची परिक्रमा असे दोन्ही उपक्रम करून आले . बंगाली मध्ये मित्राला बंधू असे म्हणतात . मी यावर कुठल्याही प्रकारचे काहीही भाष्य केले नाही . दोघेही सुजाण होते आणि ते काय करत आहेत याची दोघांनाही चांगली जाणीव होती . ज्यांनी एखादी व्यवस्था उभी करण्यामध्ये कधीकाळी कार्य केलेले आहे त्यांना मी काय म्हणतो आहे ते लगेच लक्षात येईल . एखादी व्यवस्था उभी करण्यासाठी खूप कष्ट आणि खूप मेहनत लागलेली असते . त्यासाठी अनेक घटकांचा विचार करून अनेक त्वरित परिणामांचा , संभाव्य परिणामांचा धांडोळा घेऊन मगच प्रक्रिया निश्चित केलेल्या असतात . आपली समाजव्यवस्था देखील अशीच लाखो वर्षांच्या अभ्यासातून तयार झालेली आहे . या किंवा नर्मदा परिक्रमेसारख्या अन्य कुठल्याही व्यवस्थेला विपरीत ठरेल असे काही करायला विशेष बुद्धिमत्ता लागत नाही . परंतु आपण ते का करतो आहोत व त्यातून काय साध्य होणार आहे याची चांगली जाणीव कर्त्याला असली पाहिजे .इतकेच वाटते . प्रस्थापित उत्कृष्ट व्यवस्थेला सतत मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन विरोध करणे हे काही फार बुद्धिमान असल्याचे लक्षण नसून व्यवस्थे कडून बहिष्कृत केले जाण्याचे अथवा प्रसंगी ठेचले जाण्याचे दृश्चिन्ह त्यामध्ये बीजभूत आहे हे अशा प्रकारच्या बंडाळ्यांचा इतिहास पाहता दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते . असो . 
इथे नर्मदा माता पूर्णपणे दगडी कडे कापत वाहत असल्यामुळे किनाऱ्याने चालण्यासाठी मार्ग नाही . तसेही नर्मदेच्या काही गुप्तधारा या दगडाखालून वाहत असल्यामुळे इथून जावयाचे नसते त्यामुळे मी पहाटे लवकर निघून ओंकारेश्वर बस स्थानकापर्यंत सडक मार्गाने गेलो आणि तिथून पुन्हा जंगलामध्ये शिरून नर्मदेचा काठ शोधायचा प्रयत्न सुरू केला . इथे माझ्याकडून पुन्हा एकदा थोडीशी गडबड झाली . परंतु जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात ! मार्ग भटकल्यामुळे ओंकारेश्वर च्या आसपासचे जंगल किती अप्रतिम आहे हे मला पाहता आले आणि सुमारे दोन-तीन तास मी त्या जंगलामध्ये वाट मिळेल तसा भटकत राहिलो ! अखेरीस एका सुंदर अशा ओढ्याने मला नर्मदा मातेकडे जाण्याचा मार्ग दाखविला . हा ओढा केवळ स्वर्गीय होता . माझ्या नशिबाने मला तो गुडघाभर पाण्यातून ओलांडता आला . परंतु ओंकारेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर हाच ओढा पाच ते सहा फूट पातळी वाढवून वाहत असतो असे नंतर मला लक्षात आले . इथून पुढे मला अप्रतिम असा नर्मदेचा किनारा सापडला ! ९०% लोक ओंकारेश्वरला परिक्रमा उचलत असूनही दुर्दैवाने या काठावरील मार्गाने एक टक्का सुद्धा परिक्रमावासी जात नाहीत . इथून झालेले नर्मदा मातेचे दर्शन केवळ विलोभनीय होते ! परंतु इथे जंगलावर राज्य करणाऱ्या अन्यही काही श्वापदांनी सुंदर असे दर्शन दिले ! 


लेखांक अडुसष्ठ समाप्त ( क्रमशः )


( अपूर्ण )

लेखांक ६९ : बिबट्याने दिलेले दर्शन आणि अरण्यातील गूढरम्य मौनीबाबा गुफा आश्रम

नर्मदेचा किनारा असा नुसता शब्द मी वापरतो आहे . प्रत्यक्षात इथे विंध्य आणि सातपुडा असे दोन प्रचंड पर्वत कापत नर्मदा वाहते आहे . त्यामुळे पायाखाली फक्त धारदार कपचे असलेले खडक व ते देखील तीव्र उताराचे असा भूभाग होता . याच्यावरून चालताना अतिशय सावधपणे पावले टाकावी लागत होती कारण एक जरी पाऊल सटकले तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता .अर्थात नर्मदेमध्ये एक-दोन नावा दिसत होत्या . परंतु एकंदरीत पाणी खूप खोल होते एवढे नक्की .
या भागाचे त्याच वेळी अन्य परिक्रमाश्याने काढलेले प्रकाशचित्र
 डाव्या हाताला जबरदस्त जंगल होते . नर्मदा मातेने माझा रस्ता चुकविला हे एकादृष्टीने बरेच झाले कारण हा ओढा जिथे नर्मदेला मिळतो तिथे पाणी प्रचंड खोल होते आणि पार करण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे मला पुन्हा उलटे तरी जावे लागले किंवा सामानासकट पोहून ओढा पार करावा लागला असता . वाट चुकल्यामुळे मी तो उथळ पाण्यातून पार केला होता .
 हाच तो खोल ओढा
खाली गाळ असेल तर असे ओढे पार करता येणे अवघड असते .हे त्याच ओढ्याचे संग्रहित चित्र आहे .
हळूहळू जंगलातील मातीने दगडांवर जम बसवला . आणि एक छोटीशी पायवाट तयार झाली . या पायवाटेवर मला बिबट्याचे ठसे दिसले . अगदी ताजे ठसे होते याचा अर्थ तो नुकताच इथून गेला होता . कदाचित आजूबाजूला कुठेतरी लपून मला पाहतही असेल . मी आपला नर्मदेचा जप करत पुढे चालू लागलो . 
पुढे एक हनुमानाचे मंदिर दिसू लागले . मी एक पाऊल ठेवायला मिळेल असा दगडी रस्ता पकडून चालत होतो .आता खाली उतरून हनुमंताचे दर्शन घ्यावे असा विचार मी करेपर्यंत खाली नर्मदेचे पाणी पिणारा एक सुंदर नर बिबट्या अतिशय वेगाने वरच्या दिशेने जंगलाकडे पळाला . बघता बघता अदृश्य देखील झाला . याचा रंग अतिशय सुंदर पिवळा होता ! मी उघड्यावरती बिबट्या प्रथमच पाहिला !त्याचे माझ्यापासूनचे अंतर २० मीटर सुद्धा नसेल .
 संग्रहित चित्र
 हा त्याचा परिसर असल्यामुळे आणि त्याला पाणी प्यायचं असल्यामुळे मारुती मंदिराकडे न जाता मी पुढे चालत राहिलो .याला पाहून माझ्या छातीमध्ये धडधड सुद्धा वाढली नाही . आश्चर्यच आहे .
 हेच ते मारुती मंदिर . मंदिरावर बसलेली वानर सेना
मी अगदी याच मार्गाने आलो
समोरच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे
 वन्य श्वापदांचे रक्षण करणे म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासारखेच आहे .

गमतीचा भाग म्हणजे मी या भागातून चालत जात असताना माझ्या मागून काही अंतरावरून सात्यकी देखील येत होता . मला हे तेव्हा कळाले जेव्हा मी फेसबुक वर त्याने टाकलेले माझेच फोटो पाहिले ! मला एकटे चालायला आवडते हे माहिती असल्यामुळे बहुतेक त्याने मला आवाज दिला नसावा . परंतु त्याला बिबट्या दिसला नाही हे देखील बरे झाले . नाही तर तो पुन्हा कधीच किनाऱ्याच्या रस्त्याने चालला नसता ! अगदी ह्याच जागी सात्यकीने काढलेले फोटो आपल्या माहितीकरता देत आहे आणि गुगल नकाशा देखील सोबत जोडत आहे .
या चित्रामध्ये नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहत आहे .डावीकडे डोंगरावर असलेला मौनी बाबा आश्रम दिसतो आहे आणि त्याच्या बरेच अलीकडे हनुमंताचे मंदिर दिसत आहे .याच ठिकाणी बिबट्याने दर्शन दिले . आता हेच मंदिर प्रत्यक्षात कसे दिसते पहा .
उजव्या हाताला नर्मदा माता आहे .डावीकडे जंगल आहे आणि उजवीकडे नर्मदेच्या काठावर छोटेसे पांढरे बांधकाम दिसते आहे तोच मारुती आहे . गंमत म्हणजे हा फोटो काढताना बिबट्या पाणी पीत होता परंतु तो डोंगराच्या सोंडे मागे लपला गेला आहे .अन्यथा खूप सुंदर फोटो आला असता . समोर चाललेला प्रस्तुत लेखक .मी मंदिराजवळ जातच बिबट्याने धूम ठोकली .
सातपुडा पर्वतावरून दिसणारी नर्मदा माता पलीकडे विन्ध्याचल . हे फोटो माझ्या परिक्रमेदरम्यानच आणि साधारण त्याच वेळी सात्यकीने काढलेले आहेत . धरणातून पाण्याचा विसर्ग झाला की इथे पाणी पातळी बघता बघता वाढते .
अखेर एके ठिकाणी उभे राहून नर्मदा मातेचे अवलोकन करीत असताना मला मागून येणारा सात्यकी दिसला .मनोज दत्ता या बंगाली बाबू ने दिलेली टोपी मी फक्त या टप्प्यामध्ये घातली आणि नंतर काही मला तो प्रकार पटला नाही त्यामुळे कायमची झोळीत ठेवून दिली . प्रस्तुत परिक्रमावासी दगडाच्या ज्या कपारीवर उभा आहे तिथून मागे किंवा पुढे गेले की तोल ढळणे निश्चित आहे . अशा हजारो कठीण टप्प्यातून काठावरची नर्मदा परिक्रमा जाते . परंतु प्रत्येक वेळेस नर्मदा तुम्हाला सावरून घेते . सुदैवाने येथे छायाचित्रकार मागेच असल्यामुळे हा सुंदर प्रसंग टिपला गेला .
हनुमान मंदिराच्या अगदी जवळ आलेला प्रस्तुत लेखक . बिबट्या अजूनही तिथेच पाणी पितो आहे .
तो इतक्या वेगाने पळाला की सात्यकीला देखील कळले नाही की इथून काहीतरी पळाले आहे .
इथून पुढे चालण्यायोग्य मार्ग नसल्यामुळे थांबून मी पाहणी करत होतो . तोपर्यंत सात्यकी मागून फोटो काढत होता . थोडेसे दगडाचा आधार घेत चालल्यावर एका पावलाचा मार्ग सापडला आणि समोर मानवी वावराच्या खुणा दिसल्या .
दुपारच्या सुमाराला जो आश्रम चुकवून तुम्हाला जाताच येणार नाही असा उभ्या खडकामध्ये बांधलेला एक आश्रम आला . याचे कारण आता नर्मदेचे दोन्ही तट उभे खडक अशा स्वरूपाचे होते . हा होता मुनी बाबा किंवा मौनी बाबा यांचा आश्रम . डावीकडे असलेल्या सातपुडा पर्वताच्या अभेद्य भिंतीमध्ये काही अति प्राचीन गुहा होत्या . या गुहांच्याच पुढे थोडेफार बांधकाम करून आश्रमाचे स्वरूप त्याला देण्यात आले होते . आश्रम अतिशय सुंदर होता . आश्रमाची व्यवस्था एक तरुण तेजस्वी साधू पाहत होता . या साधूचे नाव होते भागीरथ गिरी महाराज . गोरापान वर्ण डोक्यावर जटाभार आणि बहुतेक पूर्वाश्रमीचे उच्च विद्या विभूषित असावेत अशी भाषा . यांचे गुरु महंत आनंद गिरीजी महाराज आणि अशोक गिरीजी महाराज हे नर्मदा परिक्रमेसाठी गेले होते .
 हाच तो जुना आखाड्याचा डोंगर उतारावरील मौनी बाबा गुफा आश्रम .
आश्रमामध्ये येणारा तात्पुरता कच्चा वन रस्ता
आश्रमाच्या बाहेर केलेल्या वन उद्यानातून आत गेल्यावर हे प्रवेशद्वार लागले .
भगवान गुरुदेव दत्त हे जुन्या आखाड्याचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे इथे सर्वत्र दत्ताचे फोटो दिसतात . याच आश्रमामध्ये अतिशय गूढरम्य अशा अप्रतिम गुफा आहेत . बाहेरून छोटा दिसणारा आश्रम प्रत्यक्षामध्ये आत मध्ये गेल्यावर अनेक गुफांचा समूह आहे असे लक्षात येते . इथे परिक्रमावासींना शक्यतो प्रवेश दिला जात नाही परंतु भागीरथगिरी महाराजांना विनंती केल्यामुळे त्यांनी आम्हाला संपूर्ण परिसर स्वतः फिरवून दाखवला . या भागातील दगड हा स्फटिका सारखा चौकोनी आकारामध्ये आपोआप कापला जातो . त्यामुळे गुहांच्या आकारात देखील गोलवा नसून चौरसाकृती आयताकृती असे गुहांचे आकार आहेत . 
आश्रमातून नर्मदे कडे जाण्याचा मार्ग असा धोकादायक व तीव्र उताराचा आहे . महापुरामध्ये आश्रमा पर्यंत पाणी येते . 
आश्रमामध्ये छोटीशी गोशाळा देखील आहे . इथले कुठलेही बांधकाम म्हणजे तीन बाजूने भिंती आणि एका बाजूने पहाड आहे . 
 आश्रमाच्या पुढील भागामध्ये हा स्लॅब टाकलेला असून वरती हवन कुंड आणि सज्जा आहे . तर या स्लॅबच्याच खाली परिक्रमा वासींची निवास व्यवस्था आहे .
दोन्ही बंगाली बाबूंचे नामकरण आम्ही छोटा बंगाली आणि मोठा बंगाली असे केले होते .छोटा बंगाली सोबत असल्यामुळे त्याने प्रस्तुत लेखकाचे भरपूर फोटो या भागात काढले ! भविष्यात त्याच्याकडून ते प्राप्त झाले . वरील चित्रामध्ये जी गच्ची दिसते आहे तिथेच हे फोटो काढलेले असून या गच्चीवरच भागीरथ गिरी महाराजांबरोबर खूप विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारायची संधी मला मिळाली .
मुनी बाबा आश्रमाच्या सज्जावर उभा प्रस्तुत लेखक . अमरावतीचे संत शंकर महाराज यांचा सुती अंगरखा त्यांच्या एका शिष्यांनी मला दिला होता . तो इथून पुढे मी अंगावर चढवायला सुरुवात केली . कारण उकाडा वाढल्यामुळे थर्मल वेअरची एवढी गरज आता दिवसा तरी वाटत नव्हती . 
इथून नर्मदा मैया आणि समोरचे जंगल खूप सुंदर दिसत होते .
समोर असलेल्या पळसाच्या झाडावर असंख्य जातीचे पक्षी येऊन बसले होते . 
सात्यकी रॉय  याचे देखील काही फोटो त्याच्याच कॅमेऱ्यावर मी इथे उभे राहून काढले . 
 सात्यकी रॉय उर्फ छोटा बंगाली ! मौनी बाबा आश्रमात .
मला जंगलामध्ये एक भाला सापडला होता . तो या चित्रात दिसतो आहे . तो काठीला लावून चालायची माझी इच्छा होती . परंतु वजन वाढले असते म्हणून मी तो इथे आश्रमातच ठेवला .
 हाच तो भाला . आणि हाच प्रस्तुत लेखक . खांद्यावर घेतलेलं उपरणं दप्तराचा भार थोडासा वितरित करायचे . आणि अचानक एखाद्या हिवस्त्र प्राण्यांनी हल्ला केलाच तर आपली मान त्याच्या तोंडात सहजी सापडू नये म्हणून केलेले ते जुगाड होते . 
प्रस्तुत लेखक आणि छोटा बंगाली सात्यकी रॉय . त्याला देखील उपरण्याची युक्ती आवडली . आणि तो ती वापरू लागला . 

आमचे फोटो काढणे सुरू होते ,तोपर्यंत इकडे एक नवीन बनलेला साधू पटापट टिक्कड बनवत होता .त्याची गती पाहून मी अवाक झालो . त्यानंतर भागीरथी गिरी महाराजांशी गप्पा मारत बसलो . केसातील जटा कशा तयार होतात हे मी त्यांच्याकडून समजून घेतले . भोजन प्रसाद खूपच अप्रतिम होता . आम्ही दोघेच परिक्रमावासी इथे होतो . त्यातही सात्यकी भ्रमणा मध्ये होता . म्हणजे परिक्रमावासी मी एकटाच ! भागीरथी गिरी महाराज मला सांगू लागले . नशिबाने हा जंगलातला मार्ग फारसा कोणाला सापडत नाही . तरीदेखील देव दिवाळी झाल्यावर इथे दिवसाला शंभर दीडशे लोक जेऊन जातात . रस्त्यालगत असलेल्या आश्रमात मात्र दिवसाला हजार बाराशे लोक आरामात मुक्कामी असतात . यामार्गे फक्त नागा साधू जातात . आणि त्याचे कारण तुम्हाला मागील फोटो पाहिल्यावर लक्षात आले असेलच . परंतु या सर्व लोकांना भोजन प्रसाद देण्याची व्यवस्था इथले आश्रम विना तक्रार करतात . त्यांना माहिती असते की यातील निम्म्याहून अधिक लोक लवकरच गळणार आहेत आणि घरी परत जाणार आहेत . परंतु असा कुठलाही विचार किंवा भेदभाव न करता अन्नदान केले जाते . या आश्रमात मुक्काम करावा असे वाटत होते ! महाराज सुद्धा थांब म्हणले होते . या आश्रमातील महंत स्वतः परिक्रमेला निघालेले असल्यामुळे यांच्याकडे आश्रम सांभाळायला ठेवला होता . त्यांनी काही दिवस चालत परिक्रमा करून नंतर गाडीने ती पूर्ण केली असे पुढे ऐकायला मिळाले . परंतु एकंदरीत वेळेचे गणित पाहता फाल्गुन महिन्यात नावा बंद होणार होत्या . त्यामुळे अधिकाधिक चालणे हेच माझ्या हिताचे होते . इथून पुढचा मार्ग जंगलातून जाणारा आणि अतिशय खडतर असल्यामुळे शिवाय जंगलात हिंस्र प्राणी असल्याचे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे छोटा बंगाली , याला मी एकट्याला मागे ठेवले नाही . सोबत घेतले . छोटा बंगाली अखंड फोटो काढत होता . परंतु त्या बिचाऱ्याचे फोटो अजिबात निघत नव्हते .मला फोटोग्राफीची खूप आवड आहे . त्यामुळेच मी सोबत मोबाईल कॅमेरा वगैरे घेतला नव्हता . नाहीतर १००% माझी परिक्रमा पूर्ण झाली नसती . नर्मदा इतकी सुंदर आहे ,इतकी अद्भुत आहे , इतकी नयनरम्य आहे की तिची किती रुपे टिपावीत आणि किती नको असे फोटोग्राफरला होते . बंगाली बाबूला मी सांगितले की तुझे काही फोटो मी काढतो . आणि ती हौस भागवून घेतली . ते फोटो मुद्दाम येथे जोडत आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही किती सुंदर , निर्मनुष्य , निसर्ग संपन्न व भयाण भागातून जात होतो हे लक्षात येईल . 
छोटा बंगाली आणि प्रस्तुत लेखक (अशी टोपी घालणे परिक्रमेमध्ये मान्य नाही याची कृपया नोंद घ्यावी . ही काही तासांपुरती घालण्यात आली होती )
उजव्या हाताला मैया पायाखाली खडक आणि डावीकडे जंगल असे अखंड कितीतरी किलोमीटर होते .
आता कॅमेरा प्रस्तुत लेखकाच्या हातामध्ये आहे आणि छोटा बंगाली पुढे निघाला आहे . माझा अगदी काठाकाठाने चालण्याचा नियम त्याला खूप आवडला होता . त्यामुळे सोबतच्या सर्वांना फाट्यावर मारून तो एकटा चालत होता . 
अतिशय शांत धीर गंभीर वातावरण . जंगलातली शांतता प्रसंगी खूप भयाण असू शकते . नर्मदा जल तर इतके स्थिर आहे की असे वाटावे की एखादे सरोवरच आहे . 
 सात्यकी रॉय याचा लेखकाने काढलेला फोटो
ढगांच्या आड गेलेल्या सूर्याच्या प्रकाशात पाय कुठे ठेवायचा याची जागा शोधत चालणारा प्रस्तुत लेखक . शेजारी रेवामाई . ही शेजारी असलीच पाहिजे ! सतत डोळ्यांना दिसलीच पाहिजे ! असा दुराग्रही हटनिग्रही परिक्रमावासी तुम्हाला दिसतो आहे ! 
दोन महिने चालून मळलेले वस्त्र आणि आजच नवीन घातलेले वस्त्र  यांच्या रंगातील फरक पहा ! फक्त मी प्रयत्नपूर्वक अशी धूळ शक्यतोवर तशीच ठेवत असे . कारण नर्मदे काठी असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांची ही धूळ अंगावर घेण्यासाठी तर परिक्रमा करायची असते ! संत पाऊले साजिरी । गंगा आली आम्हावरी ।
जिथे उडे रज धुळी । तेथे करावी आंघोळी ॥
असे तुकाराम महाराज म्हणतात ! अर्थात संतांची चरण धूळ लागलेली जी तीर्थक्षेत्रे , इथली धूळ अंगावर घ्यावी ! अभिमानाने मिरवावी . त्या धुळीने स्नान करावे ! 

थोडेसे माझ्या मागून तुम्ही देखील कल्पनेने या मार्गाने चालून पहा ! खूप मजा येते ! विंध्य आणि सातपुडा पर्वतांमधली खचदरी किती स्पष्ट दिसते आहे पहा ! एमपीएससी यूपीएससी मधला हा ठरलेला प्रश्न आहे ! नर्मदा नदी उलटी का वाहते ? त्याचे कारण ती पठारावरून न वाहता खचदरीतून वाहते . This is that Rift valley students! सोडा ते पेपर आणि नर्मदा परिक्रमा करा ! बघा कसे उत्तम गुणाने आयएएस ऑफिसर होताय ! 
मगाशी मी सांगितले तसे इथले दगड कसे सरळ रेषेमध्ये खचतात पहा  .खडकांवरच्या रेषा पहा .
सह्याद्री मधला बेसाल्ट असा फुटत नाही . या गुणधर्मामुळे या दगडांना प्रचंड धार असते आणि तुम्हाला फार जपून पाऊल टाकावे लागते .
पण जपून पाऊल टाकणे आपल्या मुळातच नाही ! दे दणादण उड्या मारत परिक्रमा पूर्ण केली ! नर्मदा मातेच्या कृपेने आपल्या पायाला काहीही इजा होत नाही , खरचटत नाही ,मुरगळत नाही ,तूट फूट होत नाही हे कळल्यामुळे बिनधास्त अशा उड्या मारायचो ! जय हो माई की ! चिंता काहे की ! छोटा बंगाली बाबू फोटो चांगले घ्यायचा . तुम्हीच कल्पना करून पहा .इतके मोठे खडक आडवे आल्यावर ते जर जिन्यासारखे चढायला लागलो आणि उतरायला लागलो तर किती वेळ लागेल ! त्यापेक्षा एका उडीत तो उल्लंघून जायचा . ते सोपे पडायचे . 
कल्पना करून पहा अशा ठिकाणी जर बिबट्या तुमच्या मागे लागला तर ? हा हा हा ! या केवळ कल्पनाच ठरतात ! कारण नर्मदा माता शेजारी असल्यामुळे परिक्रमा वासींना कुठलाही प्राणी जरा सुद्धा त्रास देत नाही असा जाज्वल्य इतिहास आहे ! आणि इतके दिवस हे कदाचित माझे अनुमान होते परंतु आज पासून माझा अनुभव देखील असाच होता ! त्यामुळे अतिशय निर्धास्तपणे जंगलातली वाटचाल चालू ठेवली ! 

लेखांक एकोणसत्तर समाप्त ( क्रमशः )

लेखांक ७० : धर्मवीर बलिदान मास आरंभ आणि रमणीय नजर निहाल आश्रम

कोsहम्

आज फाल्गुन महिना सुरू झाला होता . गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील आणि काही प्रमाणात महाराष्ट्रा बाहेरचे देखील तरुण हा महिना श्री धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात . 

या गुरुजींच्याच उपदेशा प्रमाणे सर्व सुरू होते . आज काठाकाठाने चालून जो मिळेल तो आश्रम गाठायचा असे नियोजन होते . मौनी बाबा आश्रमातील महंतांनी त्यांनी अनवाणी पायाने केलेल्या परिक्रमेचे अनुभव सांगितले होते . परंतु या भागातील खडक पाहता ते किती कठीण तप आहे याचा अंदाज येत होता . पायात बुटाचा जाडसर तळवा असूनही पाय कापतील असले खडक इथे होते . अतिशय विषम परिस्थितीमध्ये अनवाणी परिक्रमा लोक करतात . मला बलिदान मासामध्ये अनवाणी चालण्याची सवय गेली अनेक वर्ष असून देखील परिक्रमेमध्ये अनवाणी चालताना खूप त्रास व्हायचा . हे तप खरोखरच खूप कठीण आहे . आज आश्रमामध्ये भरपूर पोट पूजा झाली असल्यामुळे भूक लागलेली नव्हती . सकाळी तिथे पोहोचल्या पोहोचल्या वडे आणि भजी यांचा बालभोग मिळाला होता . त्यानंतर पुन्हा भोजनाचा आग्रह झाल्यामुळे टिक्कड भाजी खाल्ली होती . त्यानंतर खालच्या नैसर्गिक एसी असलेल्या परिक्रमावासी विश्रामगृहामध्ये एक डुलकी मारून साडेतीन वाजता पुढे निघालो होतो . नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरून चालताना सूर्य कायम दुपारनंतर तुमच्या डोळ्यासमोर चमकत असतो .त्यामुळे कधी कधी डोके सुद्धा दुखते इतका त्याचा उष्मा तीव्र असतो . त्यात बरेचदा नर्मदा जलामध्ये त्याचे प्रतिबिंब चमकत राहते . अशावेळी समोरून येणाऱ्या आपोज्योतीच्या तेजामुळे डोळ्यांची दृश्यमानता कमी होऊन जाते . उत्तर तटावर चालताना दिवसाच्या पूर्वार्धामध्ये ही परिस्थिती असते . असो . आज मैया पूर्णपणे खडक कापत निघाली होती रंगीबेरंगी हिरवे जांभळे राखाडी खडक कापत तिचा वेगाने प्रवास चालू होता रस्ता नव्हताच पण एकंदरीत चालायला मजा येत होती मध्ये शेकडो फूट खोल नरसिंह कुंड आणि एक साधू कुटी लागली . नरसिंह कुंडाच्या इथे खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत होती . इथे नर्मदा माता प्रमाणाच्या बाहेर खोल आहे . तिच्या स्वच्छ पाण्याचा तळच दिसत नाही . साधू कुटीमध्ये साधारण नव्वदीचे वय असलेले एक साधू महाराज खाटेवर निवांत बसले होते .त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी थोडावेळ सत्संग घडला . त्यांचे शरीर अतिशय कृृष झाले होते परंतु तरीदेखील हालचालींमध्ये कमालीची तत्परता आणि आवाजामध्ये जरब होती. परिक्रमा करण्याचा आमचा मार्ग अतिशय योग्य आहे असे त्यांनी मला सांगितले . या मार्गाने फारसे कोणी जात नाही हे देखील त्यांनी सांगितले . बंगाली बाबू ने महाराजांच्या चरणाशी बसलेला एक फोटो काढला . 

नरसिंह कुंडा जवळच्या साधू कुटीतील साधू महाराज आणि प्रस्तुत लेखक

नर्मदे काठी असे अनेक साधू तपस्वी संन्यासी आपापल्या मस्तीमध्ये मस्त आहेत ! हे लोक बाहेर कुठे जातच नाहीत . साधू म्हटल्यावर आपण टीव्ही , प्रसारमाध्यमे , सोशल मीडिया इत्यादीवर ज्या साधू लोकांना पाहतो ,  तीच प्रतिमा आपल्या मनामध्ये असते . परंतु हे सर्व बहिर्मुख कार्य करणारे संत आहेत . खरे अंतर्मुख संत पाहायचे असतील तर नर्मदा परिक्रमा करण्याशिवाय सोपा पर्याय नाही . स्वत्वाची पूर्णपणे राख केलेली ही अजब निस्पृहता आहे . तिची तुलना कुठल्याही चकाचक फाईव्ह स्टार तथाकथित साधूत्वाशी होऊ शकत नाही . जगामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये अनेक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूंचे पेव सध्या फुटलेले आहे . आणि पाठांतर चांगले असल्यामुळे ते तुम्हाला काही संकल्पना ऐकवू देखील शकतात . परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे "प्रचितीचा महंत " मिळणे खरंच खूप कठीण असते . तो तुम्हाला असा गिरी कंदरांमध्येच शोधावा लागतो . असो .

या भागातील प्रस्तर खचून तिरके झाले होते आणि त्याच्या मधून नर्मदामाता वेगाने वाहत होती . सातपुडा आणि विंध्य पर्वत यांची धडक झालेला हा भाग आहे . नर्मदा मातेची खोली शोधणे खरोखरच खूपच कठीण काम आहे . इथे आता नावांची वर्दळ दिसू लागली . एका नवाड्याने सांगितले की पुढे नजरनिहाल आश्रम नावाचा आश्रम आहे . तिथे मुक्काम करावा . नर्मदानंद स्वामी नावाच्या एका संन्यासी महाराजांनी हा आश्रम उभा केलेला आहे . 

 

श्री नर्मदानंद स्वामी

तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत नर्मदानंद स्वामी

अतिशय सुंदर असा घाट , वरती संगमरवरी हनुमान मंदिर ,अतिशय अप्रतिम जनावरे असलेली सुंदर गोशाळा आणि जिवाभावाने परिक्रमावासींची सेवा करणारे सेवक कुटुंब असा तो आश्रम होता . मी आश्रमामध्ये गेल्यावर तिथे एक सेवेकरी दोन बैलांच्या सहाय्याने आश्रमाची जमीन नांगरतो आहे असे मी पाहिले . एका वयस्कर आजोबांनी आसन लावण्याची सूचना केली .  आश्रमामध्ये पत्र्याची एक मोठी शेड होती तिथे उघड्यावरतीच मी आणि बंगाली बाबू ने आसन लावले . मला नांगरणी पाहायला खूप आवडते . परंतु प्रत्यक्षामध्ये बैलांची नांगरणी मी कधी केलेली नव्हती . माझे सर्व मामा उत्तम शेती करणारे होते आणि स्वतः मोट धरणे , नांगरट करणे , कुळव चालवणे ,ही सर्व कामे त्यांना जमायची . परंतु मला कळायला लागल्यापासून ट्रॅक्टरनेच शेतामध्ये प्रवेश केलेला होता . त्यामुळे माझ्या मनात झालेली इच्छा ओळखून त्या माणसाने थेट बैलांचे कासरे माझ्या हातात दिले आणि मी नांगरायला सुरुवात केली . आधी माझा नांगर सरळ रेषेत फिरत नव्हता . परंतु लवकरच नांगरटीचे सूत्र  माझ्या लक्षात आले आणि संपूर्ण क्षेत्र नांगरण्याचा आनंद मी घेतला ! त्या माणसाला देखील थोडीशी विश्रांती मिळाली . इथे प्रकाश पाटीदार आणि त्याची परिक्रमावासीकर्तव्यदक्ष पत्नी ज्योतीताई असे कुटुंब सगळी व्यवस्था पाहत होते . यांची दोन मुले अनुराधा आणि जीवन आई वडिलांना मदत करायचे . प्रकाशचे आजोबा गोविंदरावजी पाटीदार हा मनुष्य फारच अवलिया होता ! त्यांच्याकडे एक सुरेख गोफण होती . आश्रमामध्ये शक्य ती सर्व फळझाडे फुलझाडे महाराजांनी लावलेली होती . इथे माकडांचा उपद्रव खूप होता . त्यामुळे त्यांनी माकडांना पळवून लावण्यासाठी एक पाळीव माकड ठेवले होते . याचे नाव रँचो असे होते . परंतु त्याला कर्करोग झालेला असल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या . एका झाडावर एका विशिष्ट खोबणी मध्ये ते दिवसभर बसून राहायचे . त्यामुळे माकडांना पळवून लावण्यासाठी गोविंदराव पाटीदार या गोफणीचा वापर करायचे . गोफणीने दगड फेकून मारता येतो इतकेच मर्यादित ज्ञान मला होते . परंतु गोफण किती अचूकपणे वापरता येते हे मी आयुष्यात कधी पाहिलेले नव्हते . गोविंदराव मला म्हणाले की तुम्ही पाया थोडे अंतर घेऊन उभे रहा . माझ्यामागे एक लोखंडाचा खांब होता . मला काही कळायच्या आत त्यांनी गोफण फिरवली आणि माझ्या मागून खंण्णण असा जोरात आवाज झाला ! गोविंदरावांनी मारलेला खडा माझ्या दोन पायांच्या मधून जाऊन खांबावरती आपटून पुन्हा त्यांच्या पायापाशी येऊन पडला होता ! मला हा योगायोगाने बसलेला नेम आहे असे वाटले . परंतु त्यांनी पुन्हा एकदा तसाच खडा मारला आणि खांबावर आदळून बरोबर त्याच जागी तो पुन्हा येऊन पडला ! खांबाचा आकार दंडाकृती असल्यामुळे तो जर बरोबर सरळ रेषेत बसला तरच माझ्या पायांमधून परत येणे शक्य होते . जरा जरी बाजूला बसला तर दगड दुसऱ्या दिशेला निघून गेला असता ! 

गोविंदराव पाटीदार यांच्या गोफणीचा सात्यकीने काढलेला फोटो

मला आश्चर्य वाटत आहे हे पाहून गोविंदरावांना मौज वाटायला लागली आणि त्यांनी मला अनेक गोष्टी नेम धरून उडवून दाखवल्या ! गोफणीने इतका अचूक नेम साधता येतो हे मला खरोखरच माहिती नव्हते . अतिशय लहान वय असल्यापासून गोविंदराव गोफण खेळत होते त्यामुळे त्यांची ही साधना सिद्ध झाली होती ! आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा आणि नियमितपणे करत राहिले तर त्याच्यामध्ये अचूकता येत जाते . पाटीदार आजोबांनी मला गोफण फिरवायला शिकवले . आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता तो एकदा नजरे खालून घालावा म्हणून मी चक्कर मारू लागलो . गो शाळेतील जनावरांनी माझे लक्ष वेधले . इथे अतिशय सुंदर जातिवंत अशा वीस गिरगायी होत्या दोन भव्य दिव्य नंदी होते आणि एक कामधेनु होती . कामधेनु म्हणजे अशी गाय जिला पाच थानं असतात व सर्व स्तनातून ती दूध देते ! इथे गाईंना खूप चांगल्या पद्धतीने ठेवले होते . गाई सारखा प्रेमळ पशू दुसरा नाही . मी ज्या ज्या आश्रमामध्ये राहिलो त्या त्या आश्रमातील गोसेवेचा पुरेपूर आनंद घेतला . गो सेवेसारखे पुण्यदायक आणि आरोग्यदायक दुसरे काही व्रत नाही !

नजर निहाल आश्रमातील एका सुंदर गोमाते सोबत प्रस्तुत लेखक

 इथे असलेला मुख्य वळू अतिशय मारका होता असे मला सांगण्यात आले होते . परंतु त्याने पहिल्या स्पर्शापासून मला खूप प्रेमाने आणि आदराने वागवले !

नजर निहाल आश्रमातील मारका म्हणून ओळखला जाणारा प्रेमळ वळू

याला कुरवाळून घेण्याची खूप आवड होती .याच्या तुलनेने पलीकडची गाय किती छोटी दिसते आहे पहा .

हे सर्व फोटो ज्योतीताई पाटीदार हीने प्रकाशच्या मोबाईलवर काढले आणि माझ्या मित्राकडे पाठवून दिले . हा वळू कोणाला तरी हात लावू देतो आहे याचे आश्चर्य वाटल्यामुळे तिने फोटो काढायला सुरुवात केली ! शक्यतो जनावरे जनावरांना त्रास देत नाहीत ! ;)

 त्यानंतर इथली सर्वाधिक दूध देणारी गाय देखील मी पाहिली . कामधेनु माता ही तर साक्षात परमेश्वरी अवतार वाटत होती इतकी ऊर्जा तिच्या आजूबाजूला जाणवत होती ! 

हीच ती कामधेनू .मागे स्वामीजींचा फोटो दिसत आहे .

मला ही गोशाळा फारच आवडली . कामधेनू अतिशय शांत होती . तिच्या कानाचा आकार किती मोठा आहे ते पाहताना प्रस्तुत लेखक .

गो वंशा  सोबत वेळ कसा जातो कळतही नाही .सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशी ही गोमाता मला खूप आवडली .

इथे ज्योतीताई गोसेवा करण्यासाठी येत असत . अतिशय उंच अंगकाठी असलेली ही धडधाकट स्त्री भारतीय लष्करामध्ये मोठ्या अधिकारी पदावर गेली असती असे तिच्याकडे बघून मला वाटले . तिला मी तसे बोलून देखील दाखवले . तिने सांगितले की तिची पोलीस किंवा लष्करामध्ये जाण्याची खूप इच्छा होती . परंतु लवकर लग्न झाल्यामुळे ते स्वप्न अर्धवट राहिले असे ती म्हणाली .मला हे अजूनही न उघडलेले कोडे आहे की लग्नापूर्वीचे स्वप्न आणि लग्नानंतरचे स्वप्न हे वेगळे कसे काय असू शकते ! स्वप्न हे स्वप्न असते ! ध्येय लग्नानंतर बदलणार असेल तर ते काही चांगले नाही . मुक्त संवाद साधून आपल्या ध्येयधोरणांची कल्पना माता-भगिनींनी आपल्या पतींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली पाहिजे असे वाटते .  संवाद तुटला की प्रगती खुंटते . पुरुषांनी देखील आपले कर्तव्य समजून जोडीदाराच्या योग्य त्या स्वप्नांना उभारी देण्याचे कार्य आवर्जून केले पाहिजे . तिची दोन्ही मुले चांगली उंच होती . किमान त्यांना तरी सैन्य अथवा पोलीस भरतीच्या दृष्टीने प्रयत्न करायला मी सुचविले . मुलांची माझी चांगली गट्टी जमली . दोघेही माझ्या आसनापाशी येऊन बसले होते आणि त्यांच्या अभ्यासाच्या वह्या ,चित्रकलेच्या वह्या वगैरे मला दाखवीत राहिले . मी सर्वच मुलांना चांगले हस्ताक्षर कसे काढायचे याचे नमुने काढून देत असे . तो कित्ता गिरवत बसण्यासाठी त्यांना सांगायचो . या मुलांनी माझ्याकडून नर्मदा मैया , शंकराचे तांडव नृत्य , रंग अवधूत महाराज अशी विविध चित्रे काढून घेतली .बलिदान मास सुरू झाल्यामुळे आज रात्री जेवणार नव्हतोच . त्यामुळे केलेला स्वयंपाक सर्वांना मी वाढला आणि नैवेद्याचे दूध घेऊन झोपी गेलो . पाटीदार आजोबांना शस्त्रांची आवड असल्यामुळे इथे वंश परंपरागत घराण्यातील पुजेतील तलवार ,गोफण ,लगोर अशी सर्व शस्त्रे होती . एक अतिशय मोठा शाळीग्राम आणि स्फटिकाचे सुंदर शिवलिंग देखील पूजेमध्ये होते . आश्रम मला खूपच आवडला . पाटीदार काका काम झाले किती गोफण कंबरपट्ट्यासारखी कमरेला बांधून ठेवत . एखाद्या बंदुकीपेक्षा घातक असे हे शस्त्र होते ! मला वाटेत कुणीतरी भरपूर सुकामेवा दिला होता . तो मी रांचो माकडाला भरवावा म्हणून त्याच्यापुढे धरला . तर गंमत म्हणजे हा त्यातील फक्त काजू काजू निवडून खाऊ लागला ! बदाम , खारीक, मनुका , बेदाणे ,पिस्ते यातील काहीही तो खात नव्हता ! मला या प्रकाराची फारच मौज वाटली ! प्रकाश देखील अतिशय सुस्वभावी , सरळ आणि सज्जन मनुष्य होता . सतत काही ना काही काम करत राहायचा . इथे बाहेर गावच्या येणाऱ्या स्वामीजींच्या शिष्यांसाठी उत्तम अशी निवास व्यवस्था गोशाळेच्या वर केलेली होती . ती त्याने फिरवून मला दाखवली . ओंकारेश्वर वरून मोर टक्क्याकडे जाणारा एक डांबरी रस्ता आहे . या रस्त्यावरून या आश्रमाकडे येण्यासाठी रस्ता आहे असे त्यांनी मला सांगितले . स्वामीजी तीर्थयात्रेसाठी गेलेले होते . त्यांच्याबद्दल इथले सर्वच लोक अतिशय आदराने बोलत होते आणि भरभरून त्यांचे कौतुक सांगत होते . वरिष्ठांच्या माघारी त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असेल तर ते वरिष्ठ खरोखरच खूप चांगले असतात ! कारण ते चांगले नसतील तर त्यांच्या अपरोक्ष उखाळ्या पाखाळ्या करण्याची संधी शक्यतो कोणीही दवडणार नाही ! 

सुका मेवा दिल्यावर त्यातले फक्त काजू निवडून खाणारे कर्करग ग्रस्त 'रँचो ' माकड आणि प्रस्तुत लेखक . वरच्या खोबणीमध्ये ते बसून राहायचे . त्याने लघवी देखील तिथेच केलेली ओघळावरून दिसत आहे .

Rancho घे !

नजर निहाल आश्रमाचा सुंदर परिसर . नजर निहाल म्हणजे केवळ नजरेने सांभाळ करणारा ! नजर निहार असा मूळ शब्द असून हे विशेषण कासवी साठी वापरले जाते . अशी कवी कल्पना आहे की कासवी केवळ नजरेने आपल्या पिलांचे पोषण करते . त्याप्रमाणे परमेश्वर किंवा नर्मदा माता केवळ नजरेने आपल्या भक्तांचे कल्याण करते .

नजर निहाल आश्रमाचा नर्मदे वरील घाट

आश्रम अगदी नर्मदे काठी आहे

सुंदर असे छोटेखानी संगमरवरी हनुमानाचे मंदिर आपले स्वागत करते

नजर निहाल हनुमानजी

ओंकारेश्वर मोरटक्का महामार्गावरील आश्रमाच्या महाद्वाराचे बांधकाम सुरू असताना देखरेख करणारे स्वामीजी

आश्रमातील गुरु पादुका स्थान

आश्रमामध्ये अशी शेती केलेली आहे . मी हीच शेती नांगरली

ह्याच पत्र्याच्या शेडमध्ये उघड्यावरती आम्ही झोपलो होतो .

आश्रमातील सुंदर आणि आदर्श गोशाळा . आता याच्यावर दुमजली बांधकाम असून निवास व्यवस्था केलेली आहे .

आश्रमात स्वामीजींसाठी लावलेला एक झोपाळा असून त्याच्यावर अन्य कुणाला बसू दिले जात नाही

झोपाळ्यावर बसून भक्त मंडळींशी चर्चा करताना नर्मदानंद स्वामीजी

नजर निहाल आश्रमाचे श्री नर्मदानंद स्वामी नर्मदा दर्शनाचा आनंद घेताना

या आश्रमामध्ये तुम्ही पुन्हा कधी देखील या असे पाटीदार काकांनी मला सांगितले . त्यांचे नुसते हे शब्द देखील खूप आश्वासक आहेत . कारण आपण आता जाणताच की ९०% परिक्रमा वासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू करतात . आणि तिथून निघाल्यावर पहिल्या दिवशी माणसे कमी चालतात त्यामुळे जवळपास प्रत्येक परिक्रमावासी मुक्कामासाठी याच आश्रमामध्ये सर्वप्रथम येतो . त्यामुळे इथे एका वेळेला एक हजार दीड हजार असे परिक्रमावासी हंगामामध्ये येत असतात ! यातील बहुतांश लोक नंतर परिक्रमावासी राहत देखील नाहीत हे पण आपण पाहिले . परंतु पहिल्या काही दिवसांच्या उत्साहामध्ये या भागातील , पुढच्या महिन्याभरातल्या टाप्यातले आश्रम हे खरोखरीच प्रचंड तणाव सहन करतात . त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे . असे असूनही एखाद दुसरा परिक्रमावासी आला तरी देखील त्याच्या अगत्यामध्ये कुठलीही कसर हे लोक सोडत नाहीत हे पाहून फार बरे वाटले ! कल्पना करून पहा हे वर्तन किती कठीण आहे . त्यात ज्या दिवशी सर्वांची परिक्रमा संपते अशा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो . म्हणजे खरंतर या लोकांसाठी सुट्टी चालू होण्याचा तो दिवस होता . मैया चा काठ अशा अद्भुत सेवाधारी लोकांनी गजबजलेला आहे . या सर्व लोकांमध्ये एकच समान धागा आहे . हे सर्वजण मैयाला आपली आई मानतात .  तिच्या पवित्र जलावरच त्यांचे देह पोसलेले आहेत . परिक्रमावासी तर किती प्रकारचे पहावेत ! माझ्यासारखा एखादा दुसरा अनुभव लिहून ठेवणारा परिक्रमावासी सोडला तर अनुभवांची खीजगणती देखील न ठेवणारे परिक्रमा वासी ९९ .९९% आहेत ! अर्थात मी देखील त्यातलाच एक होतो ! ज्या दुकानदाराने मला डायरी आणि पेन दिले आणि मोठ्या अज्ञार्थक शब्दात रोज रात्री दिवसाचे सर्व अनुभव लिहून ठेवायला सांगितले ,त्याच्या इच्छेचीच ही परिणती आहे . आणि नर्मदे काठी बसलेल्या कुठल्याही माणसाची इच्छा ही नर्मदेचीच इच्छा असते असा अनुभव हळूहळू प्रत्येकालाच येऊ लागतो ! असो .

सकाळी लवकर येथून प्रस्थान ठेवले . पुढे जाताना काठावरतीच श्री श्री रविशंकर यांच्या शिष्यांनी उभा केलेला एक आश्रम दिसला . सात्यकीला हा आश्रम पाहायचा होता . मलाही उत्कंठा होती . म्हणून आम्ही आत मध्ये जाऊन आश्रमामध्ये फेरफटका मारला .परंतु तिथे कोणीही नव्हते त्यामुळे पुढे निघून गेलो परंतु आश्रम अतिशय सुंदर होता . नर्मदे काठी जाऊन साधना करण्यासाठी अतिशय उत्तम असे ते ठिकाण मला वाटले . आर्ट ऑफ लिव्हिंग चे चे कुणी भक्त असतील त्यांनी आवश्य या आश्रमात जाता येते का ते पाहावे . 

आर्ट ऑफ लिविंग चा आश्रम

आश्रमाचे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे

श्री श्री आश्रम

हे शब्द खूप वास्तववादी आहेत

श्री श्री रविशंकर यांचा विषय निघालाच आहे म्हणून मला आलेला त्यांचा एक अनुभव नमूद करावासा वाटतो . फार वर्षांपूर्वी माझा एक मित्र माझ्या मागे लागला होता की तू आर्ट ऑफ लिविंग चा बेसिक कोर्स कर . माझे वैयक्तिक मत असे होते की जिथे अध्यात्म आहे तिथे पैसा नाही आणि जिथे पैसा आहे तिथे अध्यात्म नाही . त्यामुळे मी त्याला म्हणालो की कोर्स करायला माझी हरकत काही नाही परंतु त्यासाठी ते फी आकारतात ते मला आवडत नाही . तुझे गुरु जर खरे असेल तर ते मला मोफत सर्व विद्या देतील ! आणि मगच मी त्यांना मानेन . मित्राचा निरुपाय झाला . पुढे काही वर्षांनी माझा एक उच्चपदस्थ अधिकारी मित्र एके ठिकाणी पंधरा दिवसाच्या कोर्ससाठी दक्षिण भारतामध्ये आला होता .काही निवडक अधिकाऱ्यांसाठी हे खास शिबिर आयोजित करण्यात आले होते . त्याचा मला संदेश आला की मी दक्षिण भारतात आलो आहे तू देखील जवळच आहेस तर आपण भेटूया . त्याने मला आश्रमाचा गुगल पत्ता पाठवून दिला . हा श्री श्री रविशंकर यांचा बंगलोर येथील मुख्य आश्रम होता . मी नेमका आश्रमाच्या इथे पहाटे तीन वाजता पोहोचलो आणि धुवाधार पावसामुळे काहीच कळेनासे झाले . त्यात बस वाल्याने मला दोन किलोमीटर पुढे सोडले . पावसात भिजत मी आश्रमाचे महाद्वार सापडते का ते पाहत होतो . इतक्यात दुचाकीवरून एक मनुष्य जाताना दिसला म्हणून मी त्याला अडवले . या भागामध्ये सर्व जंगल होते . घनदाट जंगल ,आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस आणि पहाटेची विचित्र वेळ त्यामुळे या माणसाला मी लुटारू वाटलो . तो गाडी पळवू लागला . नेमका एक गतिरोधक आला तिथे मी धावत जाऊन त्याला गाठले . आणि विचारले की अमुक अमुक शिबिर कुठे चालू आहे . त्या माणसाला काय वाटले कुणास ठाऊक मला म्हणाला गाडीवर बसा मी तुम्हाला दाखवतो . आणि आश्रमाच्या दारावर तो आला . द्वारपालाने त्याला आत सोडले . मी उतरू लागलो . तो मला म्हणाला उतरू नका बसून रहा . आणि सुमारे दोन किलोमीटर आत मध्ये गाडी चालवल्यावर एका इमारती पाशी थांबला आणि तो म्हणाला इथे तुमचे शिबिर चालू आहे . माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मित्र फोन करून थकला होता . मला थेट समोर पाहिल्यावर त्यांनी मला घट्ट मिठीच मारली ! इतक्यात कोर्स सुरू होणार अशी सूचना झाली . ते मला त्यांच्या खोलीची किल्ली देऊ लागले . इतक्यात त्यांचा मुख्य प्रशिक्षक तिथे आला , आणि मला म्हणाला की आज यांच्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे . तुम्ही देखील हे शिबिर अटेंड करावे अशी माझी इच्छा आहे . मला प्रश्न पडला की असे कसे काय झाले ? हा प्रशिक्षकच मगाशी मला बाहेर भेटला होता !त्याने हेल्मेट घातल्यामुळे माझ्या लक्षात नाही आले ! तो मला म्हणाला की तुम्ही ज्या वेळी , ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या ठिकाणी मला भेटला आहात त्यावरून मला असे वाटते की तुम्ही आजचा दिवस शिबिराचा आनंद अवश्य घ्यावा . झाले !शिबिर सुरू झाले . तो मनुष्य म्हणाला की आज आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे गेले १४ दिवस आपण काय काय शिकलो याची उजळणी आपण आज करणार आहोत .  अशा रीतीने त्या संपूर्ण शिबिराचे सार मला त्या दिवशी शिकायला मिळाले . संध्याकाळी स्वतः श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन सर्वांसाठी होणार होते . त्यांनी नेमके सांगितले की आज आपण काहीच करायला नको .फक्त ध्यान शिकूया ! आणि अशा रीतीने स्वतः श्री श्री यांच्या मुखातून मला ध्यान करण्याची प्रक्रिया शिकायला मिळाली ! ती देखील मोफत !  याच्यापुढे घडलेला प्रसंग तर केवळ अकल्पनीय होता . रविशंकर यांचे स्वतःचे हत्ती घोडे वगैरे आहेत . त्यांचे प्रवचन जेव्हा होते तेव्हा बाहेर हत्ती घोडा उभा करतात . त्या दिवशी नेमके घोडा उधळला होता आणि हत्तीला लाथा मारायला बघत होता . काही केल्या घोडा सांभाळणाऱ्या मुलाला घोडा आवरत नव्हता . चुकून मागून हत्तीला वर्मी लाथ लागली असती तर हत्ती चवताळला असता आणि आश्रमामध्ये त्या दिवशी कमीत कमी चार हजार लोक मुक्कामी होते .त्यातील दोन एक हजार लोक आजूबाजूलाच वावरत होते . मी धावतच जाऊन घोड्याचा ताबा घेतला . काही क्षणातच घोडा मला वश झाला . त्या मुलाला मी जरा झापलेच , की असे कसे काय करतो आहेस ? घोडा नीट सांभाळता येत नाही का तुला ? तो म्हणाला हा घोडा सांभाळणारा माणूस गावाला गेला आहे . मी त्याचा मदतनीस आहे . आता घोडा तबल्यामध्ये नेऊन लावायचा होता .परंतु हा मुलगा भीतीपोटी घोड्याला हातच लावायला तयार होईना . मला म्हणाला तुम्हीच घोडा नेऊन लावा . रविशंकर यांच्या आश्रमामध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्था असून त्यांना भेटायला कोणीही सहजासहजी जाऊ शकत नाही . हा घोडा स्वतः श्री श्री रविशंकर यांचा असल्यामुळे माझ्यासाठी पहिले गेट उघडले गेले . तिथून बरेच अंतर चालल्यावर दुसरे महाद्वार लागले ते देखील घोड्याला पाहून उघडले गेले . तिसरे महाद्वार देखील अशा पद्धतीने उघडले गेले . आणि घोडा कुठे लावायचा हा मी विचार करताना समोर एका कुटीमध्ये श्री श्री रविशंकर स्वतः उभे असलेले दिसले . मी त्यांनाच विचारले की स्वामीजी घोडा कुठे लावायचा ? ते माझ्याकडे पाहून अचंबित झाले ! तू कोण आहेस बाबा ! मी त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला . त्यांनी त्यांच्या कुटी बाहेर असलेला तबेला दाखवला आणि घोडा लावून कुटीमध्ये येण्यासाठी सांगितले . कुटीमध्ये जाऊन त्यांचे रितसर स्पर्श दर्शन घडले ! मग मी त्यांना माझा अनुभव सांगितला की तुमचा कोर्स पैसे देऊन शिकायची मला इच्छा नव्हती . परंतु आता मला तुमच्या अधिकाराबद्दल खात्री पटली कारण तुम्ही मला फुकट सर्व ज्ञान दिलेले आहे ! त्यावेळी त्यांनी मला मोठे मोठे आश्रम चालविण्यासाठी निधीची , पैशाची कशी काय गरज असते हे सर्व अर्थकारण समजावून सांगितले . त्यामुळे माझ्या मनातील ही शंका कायमची दूर झाली . त्यांनी अतिशय प्रेमाने मला आशीर्वाद आणि प्रसाद दिला . मी देखील तबेल्या मध्ये अजून काय काय सुविधा करता येतील याची सर्व माहिती त्यांना दिली व त्यांनीही ती योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली . घोडेस्वारीच्या ज्ञानाने अशा पद्धतीने त्या दिवशी मला खूप मोठ्या संतांचे दुर्लभ दर्शन घडविले ! इथे आश्रमामध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले कारण इतक्या सहज या संतांचे दर्शन तिथे घेता येत नाही . परंतु माझी अशी खात्री आहे की तुमचा भाव शुद्ध असेल आणि हेतू प्रामाणिक असेल तर जे योग्य आहे ते घडतेच !  त्या दिवसापासून श्री श्री रविशंकर यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात असलेले शंकेचे मळभ दूर झाले आणि खात्री पटली की यांचे कार्य चांगलेच आहे ! अनुमानाची जागा अनुभवाने घेतली !

असो . सांगायचे तात्पर्य इतकेच की ही सर्व पार्श्वभूमी मनात असल्यामुळे हा आश्रम पहावा असे मला वाटले . परंतु तेथे कोणी नसल्यामुळे मी पुढचा मार्ग पकडला . आता पुढे नर्मदेवर काही पूल दूरवर दिसू लागले . हे मोरटक्का नावाचे गाव येणार होते . चालता चालता नर्मदेच्या पाण्यामध्ये काठी बुडवत चालण्याचा आनंद घेऊ लागलो . मी गमतीने नर्मदेला वेगळ्या वेगळ्या नावांनी हाक मारायचो ! त्यातील एक नाव होते नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी या शब्दाचा उच्चार कोल्हापुरी पद्धतीने अति अति वेगाने केला तर "नर्मदे " असे ऐकू येते ! म्हणून पहा! अशा आमच्या गमतीजमती चालायच्या ! चला आता आपण नरेंद्रमोदी सोबत मोर टक्क्याला जाऊया !

नर्मदे हर !



लेखांक ७१ : नर्मदाष्टकाची जन्मभूमी मोरटक्क्याची चिदंबर गुहा अन् टोकसरची मण्यार

कोsहम्

नर्मदे वरील दोन-तीन पुल इथून दिसू लागले .त्यांच्या दिशेने चालत राहिलो . रस्ता मार्ग लोहमार्ग आणि कॅनॉलचे पाणी घेऊन जाणारा पूल असे हे पुल आहेत . पैकी लोहमार्ग हा भारतातील एकमेव मीटरगेज मार्ग शिल्लक राहिला आहे . लवकरच त्याचे देखील ब्रॉडगेज होणार आहे . ही रेल्वे अतिशय सुंदर आहे . माझ्या लहानपणी सर्वत्र अशाच रेल्वे होत्या हे मला आठवते .

 मोरटक्का येथील नर्मदेवरील पूल

 मीटरगेज रेल्वे पूल

पुलावरून नर्मदेचे दर्शन घेण्याचे भाग्य परिक्रमा वासीना लाभत नाही परंतु ते दर्शन काहीसे असे असते

पुलाच्या खालून जाण्याचा मार्ग शक्यतो असा खडतर असतो

 किनाऱ्याचा मार्ग पकडून चालत राहिलो . वाटेमध्ये अनेक आश्रम दिसत होते परंतु आम्ही कुठे थांबलो नाही . या आश्रमांमध्ये अनेक साधू आहेत . । संत आहेत . अनेक महंत आहेत . परिक्रमेमध्ये तुम्हाला सर्वच ठिकाणावरील सर्व माणसे भेटतील असे नसते . तुमच्या नशिबामध्ये जी माणसे आहेत तेवढी तुम्हाला भेटतात . बरेचदा तुम्ही सकाळी निघालात की थोड्याच अंतरावर अजूनही आश्रम असतात जे तुम्ही टाळून पुढे जाता . तुमच्या मागे कुठेतरी मुक्काम केलेला परिक्रमावासी कदाचित या आश्रमात मुक्कामाला थांबत असतो . त्यामुळे कोणीही असा खात्रीने दावा करू शकत नाही की मी नर्मदा खंड संपूर्ण पाहिला आहे . काही ना काही पाहायचे राहूनच जाते . त्यामुळे जे काही तुम्ही स्वतः अनुभवले तेवढाच नर्मदाखंड तुम्हाला माहिती असतो . त्याच्याशिवाय देखील भरपूर घडामोडी येथे घडत असतात . विशेषतः ज्या परिक्रमावासिनी एकापेक्षा जास्त परिक्रमा केलेल्या आहेत त्यांना प्रकर्षाने हा अनुभव येतो की दरवेळी परिक्रमा नवीन काहीतरी आश्चर्यकारक असे काहीतरी समोर घेऊन येते ! दरवेळी नवीन माणसे भेटतात . नर्मदा परिक्रमा ही अशी मजेशीर आहे .असो . इथे मध्ये कुठेतरी आश्रम असलेल्या अशाच एका तरुण साधूने गूगल नकाशावर खूप सुंदर फोटो टाकले आहेत . ते आपल्यासाठी इथे जोडतो आहे

 

 त्वदीय पादपंकजम् नमामि देवि नर्मदे

 ॐ नमः शिवाय

नर्मदे काठचा सूर्योदय आणि सूर्यास्त हे चुकवू नये असेच असतात ! 

वाटेत तुम्हाला घडणाऱ्या प्रत्येक देवतेच्या दर्शनाने तुमची जन्मजन्मांतरीची पापे जळून जात असतात .

नर्मदा खंडातील लहान मुले देखील मोठ्या भक्ती भावाने परमेश्वराची भक्ती उपासना पूजा अर्चना करताना दिसतात .

साधू जीवनासाठी तर नर्मदे सारखा प्रांत नाही !

आम्ही चालत चालत मोरटक्का हे गाव गाठले . या गावातही अनेक आश्रम आहेत . त्यापैकी बहुतांश परिक्रमावासी हे भक्तराज महाराजांच्या आश्रमामध्ये राहतात . परंतु मला तिथे एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे असे दिसले . तयार मंदिरे आपल्याला अनेक दिसतात परंतु बांधकाम सुरू असलेले मंदिर पाहण्याची गंमत काही वेगळीच आहे ! उत्कंठेपोटी मी तिथे गेलो असता मला असे लक्षात आले की हे राजे राजेश्वरी धाम नावाचे मंदिर त्रिपुरा सुंदरी देवीला समर्पित आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हे बांधकाम चालू होते .  इथे संपूर्ण मंदिराचे बांधकाम कोण पाहते आहे असे मी विचारल्यावर मला कैलास जी आवले नामक एका सद्गुरूस्थांचा क्रमांक देण्यात आला . मंदिर निर्मितीचे अंदाजपत्रक साधारण दोन कोटी पर्यंत जात होते . मी तिथे उपस्थित असलेल्या एका शुभम जोशी नामक गुरुजींच्या मोबाईलवरून कैलासजींना फोन लावला . हे बडवाह येथे एका बँकेमध्ये नोकरी करत असत . आता देखील ते बँकेमध्ये होते . बँक मंदिरापासून नऊ किलोमीटर लांब होती . ते मला म्हणाले की तुम्ही तिथेच थांबा मी आत्ता तुम्हाला भेटायला आलो आणि बरोबर वीस मिनिटांमध्ये कैलास जी आवले हातातली सर्व कामे टाकून स्वतः तिथे जातीने हजर झाले ! मंदिर निर्माणा प्रति त्यांच्या असलेल्या या तळमळीचे मला प्रचंड कौतुक वाटले . त्यांनी मला त्या संपूर्ण परिसराची माहिती दिली . जयपुर येथून लाल दगड ते मागवत होते . माझे यासंदर्भातील जे काही संपर्क आहेत ते सर्व त्यांना मी दिले . हेतू इतकाच की कमी खर्चामध्ये भव्य दिव्य मंदिर उभे राहावे . मी गेलो तेव्हा मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नव्हते . परंतु आता गुगल नकाशावर पाहिले असता मंदिर पूर्ण झाल्याचे दिसते . हा संपूर्ण परिसरात अतिशय ऊर्जा युक्त होता . कैलास जी आवले मला या परिसराबद्दल माहिती सांगू लागले .भालचंद्रजी शास्त्री भारती नावाचे गोळवलकर गुरुजी यांचे मित्र तिथे राहत होते .इथे असलेल्या एका तळघर वजा गुफेमध्ये त्यांनी आयुष्यभर साधना केली . गुहेला चिदंबर गुहा असे स्थानिक लोक म्हणतात .  होय गुफा नाही गुहा असेच म्हणतात ! भालचंद्र जी मराठी होते आणि गोळवलकर गुरुजी देखील मराठी . त्यामुळे चिदंबर गुहा असे शुद्ध मराठी नाव या गुहेला देण्यात आले . गोळवलकर गुरुजी देखील अत्यंत निस्पृह असल्यामुळे त्यांनी या जमिनीतील एकही गुंठा स्वतःच्या नावे न ठेवता संपूर्ण जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे करून टाकली . पुढे संघाच्या रचनेतून इथे एखादे भव्य मंदिर उभे करावे असे ठरले . त्या मंदिराला लागूनच भक्तनिवास आणि मोठे सभागृह देखील बांधण्यात आले . चिदंबर गुहेचा देखील जीर्णोद्धार केला गेला . कैलास जी यांनी एवढे सर्व कार्य उभे केलेले असून देखील त्यांचा नम्रपणा पहा ! अजून काही सूचना अभिप्राय असतील तर आवर्जून सांगा असे ते मला म्हणाले . गेले अनेक दिवस माझ्या डोक्यामध्ये जो विषय घोळतो आहे तो मी इथे कैलास जी यांच्याशी बोललो . सुदैवाने माझ्या परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात मला मोहन साधू भेटल्यामुळे माझ्याकडून परिक्रमेमध्ये सहज होऊ शकणाऱ्या अनेक चुका झाल्या नाहीत . परंतु बहुतांश परिक्रमावासी ओंकारेश्वर येथूनच परिक्रमा उचलत असल्यामुळे आणि त्यानंतरचा पहिला मुक्काम बहुतेक वेळा मोरटक्का इथेच पडत असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या परिक्रमावासींची संख्या अत्यंत म्हणजे अत्यंत जास्ती असते . अशावेळी या सर्व लोकांना एखाद्या छोट्याशा चल चित्रपटाच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमे मध्ये काय करावे आणि काय करू नये , कसे वागावे आणि कसे वागू नये ,कसे बोलावे आणि कसे बोलू नये ,कसे चालावे आणि कसे चालू नये , हे सर्व जर प्रशिक्षण दिले गेले तर त्याचा संपूर्ण परिक्रमे दरम्यान परिक्रमा आणि काठावरील रहिवाशांना अतिशय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही . माझी ही कल्पना कैलासजींना अतिशय आवडली . त्यासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टी इथे तयार होत्या . एखाद्या भिंतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून हा चित्रपट दाखवता येण्यासारखा होता . तसेच इथे अतिशय भव्य सभागृह आणि खुर्च्या वगैरे व्यवस्था आधीपासून होती . या कामामध्ये कुठलीही मदत लागली तर मला कधीही सांगा असे मी कैलाजींना सांगितले . अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी नेहमीच उपलब्ध असते ,त्यामुळे त्याची गरज नसते हे मला माहिती होते . परंतु मी माझा भाव प्रकट केला इतकेच . कैलास जी येईपर्यंत शुभम जोशी या तेजस्वी तरुण गुरुजीने आम्हाला चिदंबर गुफा दाखवली . तळघरामध्ये अतिशय निरव शांतता होती . तिथे अक्कलकोट स्वामींची एक मूळ तसबीर होती . तिचे वजन किमान ४० किलो असावे इतकी ती जड होती . इथे स्वामी मुक्कामी येऊन गेलेले आहेत असे गुरुजींनी मला सांगितले . या गुहेमध्ये अनेक संत महात्मे राहून साधना करून गेलेले होते . त्यातील सर्वात प्रमुख नाव म्हणजे आद्य शंकराचार्य होय . त्यांनी या गुहे मध्ये राहून काही काळ साधना केली होती . याच काळात त्यांना नर्मदाष्टक हे अजरामर काव्य स्फुरले होते असे या भागात मानले जाते . इथे त्यांचा देखील फोटो होता . ही गुहा शंकराचार्यांना दाखवली कुणी असे विचारल्यावर मला गुरुजींनी सांगितले की शंकराचार्यांचे गुरु गुरुगोविंदपादजी महाराज यांची मांधात पर्वतावर गुहा आहे तसेच ते इथेही ह्या गुहेमध्ये येऊन राहायचे व त्यामुळेच त्यांनी आद्य शंकराचार्यांना ह्या गुहेत साधना करायला सांगितले . गुरुजी सांगत होते तसा अंगावर काटा येत होता ! जे नर्मदाष्टक परिक्रमावासी रोज म्हणतात आणि मी देखील काठाने चालताना बरेचदा जे मोठ्याने म्हणायचो ,त्या स्तोत्राची ही जन्मभूमी आहे या कल्पनेनेच अंग शहरून गेले !  गुहा अतिशय सुंदर आणि ऊर्जेने भारलेली होती आत मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांची देखील एक मूर्ती होती . अक्कलकोट स्वामी हे नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रचिती देत असतात . मला आज इथे स्वामींनी दर्शन दिले तसे काल मौनी बाबा आश्रमामध्ये विश्रांती घेत असताना अक्कलकोट स्वामींच्या मराठी गाण्यांची एक सीडी तिथे मला सापडली ! त्यातील सर्व गाणी मला पाठ होती . त्यामुळे त्या सीडीवरील नाव वाचावे आणि ते गाणे मी गायला सुरू करावे ,अशा तऱ्हेने स्वामींची गाणी इथपर्यंत आलो होतो ! आणि आज लगेच स्वामींनी दर्शन दिले ! या परिसराची काही चित्रे आपल्या माहिती करता देत आहे .

श्री राजराजेश्वरी मंदिर मोरटक्का

इथेच बसून आम्ही गप्पा मारल्या

मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झालेले आहे

श्री राजेश्वरी माता त्रिपुरा सुंदरी देवी

इथे अजून एक गंमत अशी झाली की शुभम जोशी गुरुजी बंगाली बाबुला म्हणाले की तू कपाळाला काहीच का लावत नाहीस ? बंगाली बाबू ने उडवा उडवी चे उत्तर दिल्याबरोबर स्वतः शुभम जोशी यांनी त्याच्या कपाळावर सुंदर असा चंदनाचा टिळा लावून कुंकवाचा नाम ओढला . आणि त्याला कुंकवाचे , तिलक लावण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याने देखील महत्त्व समजल्यासारखे केले आणि बाहेर गेल्याबरोबर नाम पुसून टाकला ! अशा लोकांना शक्यतो आपण एकटे किंवा वाऱ्यावर सोडून देतो . परंतु माझे मत थोडेसे विपरीत आहे . जो आधीचाच भक्त आहे त्याच्यावर डोके फोड करण्यापेक्षा जो अभक्त आहे त्याला भक्तिमार्गाला लावणे हे अधिक कौशल्याचे आणि कठीण काम आहे . त्यामुळे ह्या मुलासोबत बराच वेळ चालून मी त्याच्याशी विविध सामाजिक , धार्मिक , आंतरराष्ट्रीय ,राजकीय विषयांवर चर्चा करायचो आणि त्याची मते अधिक सकस आणि सरस ठरावीत यासाठी त्याला वास्तविक परिस्थितीचे भान द्यायचो . मला त्यात कितपत यश आले हे मला जाणून घ्यायचे नसून , माझ्याकडून निष्क्रियता त्यागून काही प्रयत्न झाले हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे .  फळाची आशा न धरता जर असे सर्वच सज्जन कर्म करू लागले तर दुर्जनांची मती पालटायला वेळ लागणार नाही .समर्थ म्हणतात ,

गतीकारणे संगती सज्जनांची। 

मती पालटे सूमती दुर्जनाची ।

शुभम जोशी गुरुजींच्या संगतीमुळे काही काळ का होईना बंगाली बाबूंची मती पालटली होती ! असो

इथून पुढे निघालो आणि किनारा पकडला .

आज काठाने चालताना सर्वत्र चिखल लागत होता . चिखल होण्याचे कारण म्हणजे नर्मदेच्या काठावर असलेल्या शेकडो पाणी उपसणाऱ्या मोटर्स ! या पंपांच्या जोडामधून आणि पाणी वाहून देणाऱ्या नळ्यांच्या जोडांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सांडायचे . प्रचंड काटेरी जंगले देखील या भागात होती . बाभळीच्या काट्यांचा भडिमार झालेला सगळा परिसर होता ! तमिळनाडू मध्ये वृक्षांवर काम करणाऱ्या माझ्या एका डाव्या समाजसेवी मित्राने मला सांगितले होते की पूर्वी रशियन विमाने भारतावरून फिरून कुबाभूळ या झाडाच्या बिया सर्वत्र फेकत असत . त्यांचा हेतू इतकाच होता की त्यामुळे भारतातील सुपीक जमिनीचे प्रमाण कमी होत जावे . किंवा सुपीक जमीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कष्टामध्ये वाढ व्हावी . आज भारतभर प्रवास करताना जेव्हा बाभळीची वनेच्या वने दिसतात तेव्हा लक्षात येते की हा हेतू यशस्वी झालेला आहे . असो . पाण्याच्या मोटर जड असतात त्यामुळे त्यांना नेणे आणणे सोपे जावे म्हणून तोफे सारखे गाडे केलेले या भागात आढळतात . हे गाडे उंच असल्यामुळे याच्यावरती मोटरचा सहा इंची किंवा चार इंची पाईप तिरका वर चढत जातो आणि तो पार करता येणे अवघड होऊन जाते . तसेच या पाईपला छिद्रे पडलेली असतात किंवा फाटलेला असतो किंवा जोड असतो तिथून प्रचंड पाणी गळत असते . कधी कधी पंधरा-वीस फूट उंचीच्या चिळकांड्या उडत असतात . हे पाईप आणि मोटर पर्यंत वीज नेणाऱ्या वायर्स पाहून  काळजीपूर्वक चालावे लागते . यामध्ये जरा जरी हलगर्जीपणा झाला तरी चुकीला माफी नाही ! कधी कधी या पद्धतीने झालेला चिखल १०० - २०० मीटर पर्यंत पसरलेला असायचा . त्यातून मग अतिशय सावधपणे चालावे लागायचे . पुढे बडा आली अथवा अली बुजुर्ग नावाच्या गावापासून खरगोन जिल्हा चालू झाला .खंडवा जिल्ह्यामध्ये मुबलक चिखल होता .खरगोन जिल्ह्यात त्याचे प्रमाण कमी झाले . इथे आगे रस्ता नही है हे वाक्य आता तोंडपाठ करून टाकले होते . जो भेटेल तो सांगायचा बाबाजी आगे रस्ता नही है । परंतु मी जेव्हा माझा निश्चय सांगायचो की मला काठानेच चालायचे आहे तेव्हा मात्र लगेच रस्ता सांगितला जायचा . रस्ता सांगितला जायचा म्हणजे काय तर फक्त गावांची नावे जाणून घ्यायची . रस्ता तर सोपाच आहे ! नर्मदेचा काठ ! पुढे एका सिताराम बाबांचा आश्रम लागला . छोटा बंगाली सुद्धा माझ्या मागे येतच होता . या आश्रमामध्ये तीरथदास महाराज नावाचा एक स्त्रैण साधू होता . या गावाचे नाव होते कटार . इथे सुंदर असे स्नान केले आणि भोजन केले . आता हळूहळू उकाडा वाढतो आहे असे लक्षात आले . आईच्या मायेने साधूने जेवायला वाढले .आश्रम अतिशय सुंदर होता आणि शांत निवांत होता . तिथे एक वयोवृद्ध माताजी सेवा करताना दिसल्या . मैया चे पाणी उपसून नळ तयार केला होता . नळी काळी असल्यामुळे ती उन्हा मध्ये प्रचंड तापत होती आणि त्यामुळे नळाला गरम पाणी येत होते . तिथे मी मस्तपैकी आंघोळ करून घेतली . साडेतीन वाजता पुढे निघालो . या कटार गावामध्ये अनेक आश्रम आहेत . करपात्री महाराजांचा आश्रम , गणेश दास महाराजांचा आश्रम ,निरंजन आखाड्याचा आश्रम ,नर्मदा सेवा आश्रम असे अनेक आश्रम येथे पाहायला मिळतात . ज्या आश्रमामध्ये परिक्रमावासी आधी पोहोचतो किंवा ज्या आश्रमातून त्याला बोलावणे येते तिथे जाण्याचा योग त्या त्या परिक्रमावासीच्या नशिबामध्ये असतो . एकदा एखाद्या आश्रमात तुम्ही आसन लावले की दुसरीकडे कोणी जात नाही . इथे गणेश दास बाबा नावाचे एक अगडबंब साधू राहतात . हार्मोनल डिसऑर्डर मुळे अर्थात संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे आलेला अति स्थूलपणा या महाराजांनी आपल्या अखंड साधनेने , नामस्मरणाने आणि तपाचरणाने खुजा करून दाखविला आहे .

सदा हसतमुख गणेश दास महाराज

पंचाग्नी साधना करताना गणेश दास महाराज

श्री गणेश दास महाराज कटार

इथून पुढे मला एक सामाजिक वास्तव लक्षात येऊ लागले ते नमूद करून ठेवतो . या संपूर्ण परिसरामध्ये वनवासी आदिवासी बांधवांचे बाहुल्य आहे . या लोकांना नर्मदा मातेला देवी न मानता जलदेव नावाचा दुसरा खोटा देव उभा करून त्याच्या मागे लावण्याचे षडयंत्र काही डाव्या चळवळीतील कार्यकर्ते इथे करत आहेत . लवकरच इथल्या मुलांमध्ये नक्षलवादाविषयी प्रेम निर्माण होऊन ते नक्षलवादी चळवळीमध्ये सामील होऊ शकतात अशी परिस्थिती तिथे वावरताना मला जाणवली . यावर वेळीच उपाययोजना करून या मुलांना राष्ट्रनिर्मितीच्या मूळ प्रवाहात आणणे अतिशय आवश्यक आहे . अन्यथा पुन्हा एकदा विनाकारण संघर्ष उभा राहणार हे निश्चित आहे . प्रस्थापित वर्णांमध्ये संघर्ष उभा करून त्या निमित्ताने सरकारच्या नाकी दम आणून सरकार कसे नाकर्ते आहे हे सिद्ध करून दाखवणे , व्यवस्था कशी कामाची नाही हे पटवून सांगणे आणि देशातील सत्ता ,प्रस्थापित सत्ता असे म्हणूयात फार तर , तिला उलथवून टाकून डाव्या विचारांचे राज्य आणणे ही मोडस ऑप्रेंडी प्रत्येक देशामध्ये अगदी याच पद्धतीने राबवली जाते , तशी इथे देखील राबवली जात आहे . सामाजिक आस्था असणाऱ्या लोकांनी या भागामध्ये येऊन कार्य करणे अतिशय अत्यावश्यक आहे .  जय जलदेव ,जय बडा देव वगैरे पाट्या तुम्हाला इथल्या तरुणांच्या गाड्यांवर दिसतात . त्या देवांना विरोध नसून त्या देवांच्या आडून होणाऱ्या राष्ट्रविघातक आणि राष्ट्र विभाजक विचारांच्या प्रचार प्रसाराला हा विरोध आहे . असो . मध्यंतरी जगद्गुरु नरेंद्रनाथ महाराज नाणीज यांचा एक आश्रम होता आणि अक्कलकोट स्वामींना समर्पित एक आश्रम होता . परंतु अजून उजेड असल्यामुळे चालत राहिलो . 

 अक्कलकोटस्वामी मठ

इथून पुढे किनाऱ्याने चालता चालता टोकसर नावाचे गाव आले आणि तिथला भव्य दिव्य आश्रम पाहून डोळे दिपले ! निर्विवाद पणे हा नर्मदे काठी असलेल्या अनेक मोठ्या आश्रमांपैकी एक आहे . इथे अतिशय व्यवस्थित पद्धतीने परिक्रमावासींचे आगत स्वागत आणि व्यवस्थापन केले जाते .त्यासाठी जनकल्याण समितीने खूपच भव्य दिव्य असा आश्रम उभा केला असून त्याची अत्यंत सुंदर व्यवस्था लावलेली दिसते . इथे अनेक मंदिरे असून औरस चौरस पसरलेला मोठा हॉल आहे ,ज्याच्यामध्ये अनेक परिक्रमावासी विश्रांती घेऊ शकतात . मागच्या बाजूला चक्क बांधलेले संडास आहेत ! भोजनाची देखील अप्रतिम व्यवस्था आहे . गौतमेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि गोमुख घाट आहे . परिक्रमावासींच्या निवासासाठी बांधलेल्या सभागृहातील खांब अतिशय सुंदर आहेत .परिसरामध्ये अतिशय सुंदर उद्यान निर्माण केलेले आहे . या आश्रमामध्ये आधी मी एकटाच होतो . नंतर तिथे छोटा बंगाली आला .त्याशिवाय अमरकंटकच्या जंगलात माझ्यासोबत असलेला भूषण स्वामी देखील इथे भेटला . आणि एक ओडिया तरुण परिक्रमावासी भेटला ,जो सुशिक्षित होता .उच्च विद्या विभूषित होता . परंतु खास नर्मदा परिक्रमा काय असते त्याचा अनुभव घेण्याकरता परिक्रमेला निघालेला होता . याने उशिरा परिक्रमा चालू केली असल्यामुळे त्याला पुढे एकट्याला चालावे लागणार होते . मी त्याला परिक्रमा कशी असते वगैरे सर्व माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला . मोहन साधूने मला जे काही सांगितले होते त्याचा मला प्रचंड फायदा झाला होता . तेच डोक्यात ठेवून मी त्याला सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असे थोडेफार केले . याचे नाव होते मिलन प्रधान . या घाटावर अतिशय सुंदर असा नर्मदा अंतर्गत स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता ! म्हणजे एक असा चौकोनी खोल चौथरा तयार केला होता जिथे पाणी शांत व्हायचे आणि पोहता यायचे ! अनेक तरुण-तरुणी येथे पोहण्याचा आनंद घेताना दिसले . सर्व मंदिरांची दर्शने करून भव्य दिव्य सभागृहातील एका पंख्याखाली आसन लावले . 

हाच तो टोकसर चा गोमुख घाट 

घाटाच्या बाजूला नैसर्गिक दगडाला ओलांडत नर्मदेची एक शाखा आलेली आहे . तिच्यावर पूल केला असून त्यामुळे छोटासा जलतरण तलाव तयार झालेला आहे .

या पुलावरून दगडावर जाता येते किंवा थेट पाण्यात उडी मारता येते . 

परंतु दगडावर जाऊन उडी मारण्याचा आनंद काही वेगळाच आहे !

लहान थोर सर्वजण हा आनंद सतत घेतात !

अर्थात परिक्रमावासी या दगडावर जाऊ शकत नाहीत परंतु आपल्या माहितीकरता हे संग्रहित फोटो जोडत आहे .

परिसर अतिशय सुंदर अशा उद्यानांनी भरलेला आहे .

अतिशय कलाकुसर पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने रंगविलेल्या खांबांनी परिक्रमावासी निवास सभागृह बांधण्यात आलेले आहे .

गौतमेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे

गौतमेश्वर महादेव

 सुंदर यज्ञशाळा

  परिक्रमा वासी निवास सभागृह

नर्मदा पात्रातून दिसणारा आश्रम आणि मंदिराचा विस्त्रीर्ण परिसर

 या भागातील नौका

या रैन बसेरा इमारती पुढेच मण्यार साप धरला

ओडिया परिक्रमावासी मिलन प्रधान

याने परिक्रमेसाठी सर्व आधुनिक साधने आणली होती . मी त्याला माझ्या परीने नियम समजावून सांगितले की गॉगल वगैरे परिक्रमेमध्ये चालत नाही . पुढे हा किती दिवस चालला काही कळाले नाही . परंतु एकट्याने इतक्या उशिरा परिक्रमा चालू करणे ती देखील उन्हाळ्याच्या सुमारास , हे सोपे नक्कीच नाही .  त्या रात्री एक गमतीशीर परंतु भीतीदायक प्रकार घडला .  खूप दिवसांनी भेटल्यामुळे भूषण स्वामींच्या आणि माझ्या आत्मय गप्पा रंगल्या होत्या . सतत चालल्यामुळे शांत बसायला पायांना नको वाटते . त्यामुळे भूषण मला म्हणाला की चल आपण बाहेर फेरफटका मारता मारता गप्पा मारू ! एखादी गोष्ट कशी तुम्हाला बोलावून तिच्याजवळ आणते याचे हे उदाहरण बर का ! तिन्ही सांजा झाल्या होत्या आणि चांगलाच अंधार पडला होता . पायाखाली समोर आजूबाजूला काय आहे काहीही दिसत नव्हते . इतक्यात चालता चालता माझे समोर लक्ष गेले आणि मी भूषण ला बाजूला ढकलले ! एक क्षणभर त्याला राग आला ! मी त्याला म्हणालो पटकन तुझा मोबाईल काढ आणि बॅटरी लाव ! त्या विजेरीच्या उजेडामध्ये सळसळत जाणारा काळाकुट्ट पूर्ण वाढ झालेला अतिविषारी मण्यार साप दिसला ! भूषणने मगाशी अक्षरशः त्या सापावर पाय टाकला असता ! गंमत म्हणजे आम्ही दोघेही अनवाणी होतो ! इतक्या अंधारामध्ये तो काळा साप मला कसा काय दिसला काय माहिती ! परंतु भूषणचा पाय खाली पडता पडता मी त्याला ढकलला आणि त्यामुळे तो थोडासा हेलपाटला . परंतु जेव्हा त्याने तो विषारी साप पाहिला तेव्हा त्याला हायसे वाटले की आपला प्राण वाचला 

विषारी मण्यार अथवा कॉमन क्रेट सर्पाचे संग्रहित चित्र

 त्या सापाने अजून कोणाला दंश  करू नये , आणि विषारी सर्प म्हणून त्याला कोणी मारून टाकू नये म्हणून मी त्याला हळूच उचलला . एका पिशवीमध्ये तात्पुरता भरला . आणि शेजारी असलेल्या जंगलामध्ये सोडून दिला . सर्पमित्र अनिल खैरनार , राजाभाऊ शिर्के , अमित गाडेकर , संजय जोशी यांच्याकडून प्रत्यक्ष आणि सर्पमित्र राम नाना भुतकर , आनंद चिट्ठी , निर्झरा चिट्ठी यांच्याकडून अप्रत्यक्ष पणे घेतलेल्या ज्ञानाचा अशा रितीने परिक्रमेमध्ये फायदा झाला . मण्यार हा सर्प शक्यतो मध्यरात्री संचार करतो . त्यावेळेस त्याला पकडता येणे अशक्य असते . आत्ता त्याची संचाराची वेळ नसल्यामुळे हालचाली थोड्याशा मंदावलेल्या होत्या . परंतु तो प्रसंग भूषण स्वामी आणि माझ्या चांगल्या लक्षात राहील ! इथे भोजनगृहामध्ये सुंदर अशी टेबल खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे ! परिक्रमेमध्ये गजानन महाराज आश्रम सोडल्यावर इथेच टेबल खुर्च्या पाहिल्या ! सेवेकरी अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने भरपेट जेवायला वाढत होते ! संपूर्ण परिक्रमेमध्ये सर्वत्र तुम्हाला ताजे ताजे गरमागरम अन्न वाढले जाते ! एक वेळ घरी आपले शिळे खाणे जास्त होते , परंतु परिक्रमेमध्ये शिळे खाण्याची वेळ येत नाही . रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत पाठ टेकली . राम कुटीमध्ये रात्री गाणी ऐकणारा साधू माझ्या दंडाला घाबरून कसा जंगलात पळून गेला याची कथा बंगाली बाबूला अतिरंजीत वाटायची .परंतु प्रत्यक्ष साक्षीदार आज उपस्थित असल्यामुळे मी भूषणलाच तो प्रसंग सांग , असे सांगितल्यावर त्याने संपूर्ण किस्सा बंगाली बाबूला ऐकवला आणि त्याची खातरजमा झाली . दरम्यानच्या काळात कुठे कुठे काय काय पाहिले , कुठे कुठे कोण कोण भेटले ,याची उजळणी करत आणि देवाणघेवाण करत हळूहळू निद्रादेवीला आधीन झालो .

 

टोकसर आश्रमाचा माझ्या वहीतील शिक्का

हा परिक्रमेतला बासष्ठावा मुक्काम ठरला . दिनांक होता ४ मार्च २०२२ .

लेखांक  एक्काहत्तर समाप्त (  क्रमशः )

लेखांक ७२ : रावेरखेडी मध्ये समाधीस्थ बाजीराव पेशवा अन् शिवलिंग निर्मिती साठी प्रसिद्ध बकावां

कोsहम्

काठाने चालत चालत जाताना लक्षात आले की या संपूर्ण भागामध्ये नर्मदा नदीचे पात्र अतिशय विस्तीर्ण आणि उथळ आहे . तसेच खाली गाळ किंवा वाळू नसून संपूर्ण खडक आहे ! त्यामुळे घोड्यावरून नदी ओलांडण्यासाठी हा सर्वोत्तम प्रदेश होता . इतिहास असे सांगतो की नर्मदा मातेने महाराष्ट्राचे आणि पर्यायाने दक्षिण भारताचे यावनी आक्रमणापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण केलेले आहे . कारण वर्षातील चार ते सहा महिने नर्मदा दुथडी भरून वहायची . त्यामुळे तिला ओलांडता येणे अशक्य होते . त्यामुळे शत्रूला वर्षातील काही काळच महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहता यायचे . त्यातही नर्मदा प्रत्येक घाटावर उल्लंघ्य नाही . त्यामुळे या भागासारखे थोडेसेच प्रांत आहेत जिथून घोडदळा सकट सैन्य नर्मदा पार करू शकते . या भागातून मराठ्यांचे घोडे अनेक वेळा गेलेले आहेत . अटकेपार झेंडा लावताना किंवा पानिपतच्या युद्धाला जाताना मराठ्यांनी हाच मार्ग वापरला होता . त्यामुळेच मराठेशाहीच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे .  इथे मराठेशाहीतील काही बांधकामे आपल्याला आढळतात . विशेषतः नदीवर स्त्रियांना सुरक्षितपणे पाणी भरता यावे यासाठी बांधलेले घाट आणि पाण घाट अथवा पनघट देखील आढळतात . मोहे पनघट पर नंदलाल छेड गयो रे हे गाणे आपण ऐकलं असेल . यातील पनघट म्हणजे पाणी भरण्याचा घाट . या घाटाकडे जाणाऱ्या स्त्रियांवर कोणी वाईट नजर टाकू नये म्हणून आठ ते दहा फुट उंचीच्या भिंती दोन्ही बाजूने बांधलेल्या असतात . आणि नदीच्या बाजूला एक छोटेसे दार असते . भिंती पाण्यामध्ये बुडलेल्या असल्यामुळे भिंतीच्या बाहेरून येणारा माणूस पनघट मध्ये जाऊ शकत नाही . प्रत्यक्षात मला असे जाणवले की या पनघट मधून संपूर्ण घोडदळ देखील इकडून तिकडे जात असावे . असाच एक मोठा पनघट आम्हाला आडवा लागल्यावर तो ओलांडायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला . त्याची भिंत सुमारे दहा फूट उंच होती . धावत येऊन भिंत चढावे तर ते शक्य नव्हते . मग आजूबाजूला पडलेली दगडे रचून मी थोडीशी उंच पायरी तयार केली . त्यावरून मोठ्या कष्टाने भिंतीवर चढलो माझ्यामागे छोटा बंगाली येतच होता . त्यालाही एका हाताने वर घेतले . इथे मात्र त्याचे पाय लटलट कापायला लागले . आता आम्हाला आडवी आलेली ती भिंत पूर्णपणे पार करायची होती . च्या दोन फूट रुंदीच्या दगडी भिंतीवरून आधी उजवीकडे चालत जाऊन , मग दरवाजा ओलांडून पुन्हा डावीकडे वळून समोरच्या बाजूची भिंत ओलांडून ,त्याच्या पलीकडे उडी मारायची होती . काही लोकांना उंचीवरून खाली बघण्याचा फोबिया असतो . अर्थात भय असते . तसे सात्यकी चे झाले होते . बर तो माझ्यापुढे असल्यामुळे मी त्याला ओलांडू सुद्धा शकत नव्हतो . अखेरीस घाबरून तो खाली बसला . तो खाली बसल्याबरोबर मी त्याला ओलांडले आणि धावतच ती संपूर्ण भिंत पार करून पलीकडे उडी मारली . याला ती भिंत पार करायला अर्धा तास लागला . जी साधारण ३० , ४० सेकंदामध्ये पार करता येणे शक्य होते . उजवीकडे तोल गेला तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता आणि डावीकडे तोल गेल्यावर आत मध्ये माजलेल्या गवतामध्ये ,खडकाळ पृष्ठभागावर पडण्याची खात्री होती . अखेरीस कसा बसा बंगाली बाबू पार झाला . उतरण्याच्या बाजूला एक कट्टा केलेला होता . त्यामुळे उतरणे तुलनेने सोपे होते . हे खेयगाव नावाचे गाव होते . गुगल नकाशावर मला ही पनघट सापडली . आपल्यासाठी तिचे उपग्रह चित्र सोबत जोडत आहे .

 खेयगावची मराठा पनघट अथवा पाण घाट

याच्यावरून देखील मार्ग होता परंतु मी नर्मदा जलाच्या जवळून चालत असल्यामुळे पनघट ओलांडणे माझ्यासाठी जास्त सोपे होते .

या पाणी भरण्याच्या घाटा पेक्षा देखील वैशिष्ट्यपूर्ण असे काहीतरी आज मला नर्मदेमध्ये पाहायला मिळाले ! ही पनघट लागण्याच्या थोडेसे अलीकडे गंगातखेडी नावाचे एक गाव लागले .  इथे नर्मदा पात्राच्या मधोमध महादेवाची पिंड असून तिथे नर्मदेला भेटण्यासाठी साक्षात गंगा प्रकट झालेली आहे अशी मान्यता आहे .त्यामुळे नर्मदेचे वाहणारे जल इथे आपला प्रवाह उलटा वळविते आणि गंगेला एक प्रदक्षिणा मारून पुन्हा पुढे मार्गस्थ होते ! आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहता येतो ! सरळ पश्चिमेकडे वाहणारे पाणी अचानक उत्तरेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे वळते आणि वळसा मारून पुन्हा एकदा पश्चिमेकडे वाहू लागते ! मधोमध असलेल्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून नर्मदा माता पुढे जाते ! हे दृश्य साध्या डोळ्यांनी देखील पाहायला अतिशय सुंदर ,मनोहर आणि आश्चर्यकारक आहे . इथे एका वानप्रस्थाश्रमी गृहस्थाने छोटीशी कुटी टाकली होती . तिथे बसवून त्याने प्रेमाने चहा पाजला आणि बालभोग खायला दिला . समोरच गंगेची परिक्रमा करणारी नर्मदा माता पाहून धन्य धन्य वाटले ! या भागाची आंतरजालावर मिळालेली काही चित्रे आपल्याकरिता सोबत जोडत आहे ज्यामुळे आपल्याला नक्की काय प्रकार होतो आहे याची कल्पना येईल .

नर्मदा मातेच्या उदरामध्ये प्रकट झालेली गंगामैया

 एरवी उजवीकडून डावीकडे प्रवाहित होणारी नर्मदा मैया येथे या महादेवांना आणि गंगेला परिक्रमा करताना उलटी वाहते .

भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर इथे खडकांची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यामुळे एक विवक्षित उतार तयार होतो ज्यामुळे नर्मदा ज्याला उलटे व्हावे लागते . या ठिकाणी नावेने जाऊन दर्शन घेता येते . अर्थातच परिक्रमावासी या स्थानावर कधीच जाऊ शकत नाहीत .

गंगातखेडी येथील गंगा प्राकट्य स्थानाच्या कट्ट्यावरूनच घेतलेली ही सर्व छायाचित्रे आहेत . जी आपल्याला दाखवीतात की या भागातील दगड कसे उथळ आणि उतार असलेले आहेत .

गंगात खेडी येथील नर्मदा पात्रातील खडकाळपणा लक्षात घेतला म्हणजे आपल्याला कळेल की इथे नदी पार करणे सोपे आहे . 

समोरून आपल्याकडे येतायेता अचानक डावीकडे वळलेली नर्मदा मैय्या . 

या भागात नर्मदा पात्रामध्ये असलेल्या खडकाळ तळावर वरून वाहून आलेले खडे दगड गोटे गडगडत जाताना घासून घासून त्याची शिवलिंगे तयार होतात . त्यामुळे नर्मदेच्या पात्रात सर्वाधिक शिवलिंगे तुम्हाला या भागात सापडतील याची खात्री बाळगा . तरी यापूर्वी जिथे शिवलिंग तयार व्हायची ते धाराजी हे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर धरणामध्ये बुडून गेले आहे . आणि धरण ओलांडून तयार झालेली शिवलिंगे पुढे वाहू शकत नाहीत त्यामुळे आता जी शिवलिंगे सापडतात ती पूर्वीच तयार झालेली आहेत . या भागामध्ये अनेक रंगीबेरंगी दगड मात्र सापडतात . बहुरंगी दगड हे इथले वैशिष्ट्य आहे . लाल तांबूस तपकिरी पिवळा हिरवा निळा असे रंग एकाच दगडामध्ये आढळतात . या दगडाला शिवलिंगाचा आकार प्राप्त झाला की ते शिवलिंग त्यामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसते . गंगातखेडी येथील गंगामैयाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो . पन घट पार केली . मध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आणि आश्रम लागतात . नर्मदा मातेचे या भागातील रूप वेगळेच आणि सुंदर आहे . 

नर्मदेचा खडकाळ किनारा . इथून चालायला थोडेसे धोकादायक असले तरी मजा येते .

मध्ये लागलेले एक हनुमान मंदिर

नर्मदा किनाऱ्याजवळील खडकांचा आकार आणि प्रकार लक्षात घ्या . प्रचंड खडक हीच इथल्या पात्राची ओळख .

या भागातून चालताना परिक्रमा वासिनी आपला पाय मुरगळणार नाही याची काळजी घ्यावी . प्रत्येक पाऊल एकाग्रतेने विचारपूर्वक टाकावे . नर्मदेच्या काठी दिसणारे मोठ्यात मोठे दगड सुद्धा अतिशय अस्थिर असतात हे मी खूप वेळा अनुभवले . अगदी फूट दोन फुटापर्यंत ते हलू शकतात . त्यामुळे प्रत्येक पाऊल पायाखालचा पृष्ठभाग तपासून मगच टाकावे हेच अधिक हिताचे आहे .

या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरे परकीय आक्रमकांनी भग्न केलेली आहेत .त्यामुळे अशा प्रकारच्या प्राचीन हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा खच या भागात सर्वत्र आढळतो .

हे सर्व भग्न अवशेष पाहून मन विषण्ण होते .

आपल्या देशातील धर्म कुठल्या अवस्थेला पोहोचला होता हे लक्षात त्याचे असेल तर नर्मदा खंडामध्ये भ्रमण करावे . पावला पावलावर तुम्हाला तुटलेल्या मंदिरांचे अवशेष सापडतील . वरील फोटोत पहा तुटलेल्या एका मूर्तीचा चेहरा शिवलिंग म्हणून बसवला आहे . आपल्या देशामध्ये पूज्य मानल्या गेलेल्या प्रत्येक प्रतीकाचा अपमान परकीय आक्रमकांनी , वेळोवेळी मिळेल त्या पद्धतीने केलेला आपल्याला आढळतो . काही ठिकाणी शिवलिंगांचा वापर पायरी म्हणून केला गेला . काही ठिकाणी वजू खान्यामध्ये अर्थात पाय धुण्याच्या जागी शिवलिंग वापरले गेले . अनेक मूर्तींची मुंडकी उडवली गेली . अनेक मंदिरे तोडली फोडली . अनेक मूर्ती पूजक यम सदनी धाडले गेले . अनेक घराणी नष्ट केली गेली . अनेक सुंदर स्त्रिया भ्रष्ट केल्या गेल्या . जिथून मराठा फौजेची ये जा होते त्या भागात स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी पनघट बांधणे स्वाभाविक आहे . परंतु नर्मदे सारखी पवित्र नदी समोर असताना तिचे पाणी भरणाऱ्या स्त्रीला आपल्या अब्रूची भीती वाटावी अशी परिस्थिती या देशांमध्ये निर्माण झाली होती यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो . संत आणि नदी यांच्यामध्ये एक साम्य आहे . "जो जे वांछील , तो ते लाहो "असा त्यांचा भाव असतो . अर्थात ज्याला जे हवं ते त्याला मिळावं . नदी कधी पाणी पिणाऱ्या जीवाचा धर्म वर्ण जात लिंग बघत नाही . तो विवेक आपल्या ठायी असला पाहिजे की आपल्याला त्या नदीच्या संरक्षणासाठी कशी धार्मिक व्यवस्था तिच्या काठावर उभी करायची आहे . बाजीराव पेशव्यासारख्या माणसाला सुद्धा नर्मदेने भुरळ घातली आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे . संपूर्ण भारत खंडावर ज्याची समशेर एकेकाळी राज्य करत होती असा बाजीराव नर्मदे काठी चिरनिद्रिस्त झाला  ही अतिशय महत्त्वाची घटना आहे . बाजीरावाच्या घोड्याने कावेरी पासून गंगा यमुना सिंधू ते अगदी अटकेपार च्य अफगाणी  नद्यांचे पाणी पिलेले आहे असे असताना , शेवटचा श्वास त्याच्या मालकाने नर्मदे काठी घ्यावा यातच या नदीचे महान पण सामावलेले आहे . असे म्हणतात की शेवटच्या काळाला नर्मदेच्या काठी असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे बाजीराव पेशवा यांना लूचा त्रास झाला .  हे "लू" लागणे म्हणजे किती बेकार प्रकार असतो याचा अनुभव मी घेतलेला होता .  तीव्र उन्हामुळे उन्हाळी लागते आणि मनुष्याचे हळूहळू खंगत जाऊन निधन होते . अशाप्रसंगी बाजीरावांना पुण्याला किंवा अन्य कुठेतरी हलवता येणे शक्य होते परंतु त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल की मला शेवटचा श्वास नर्मदा तीरावरच घेऊ द्यावा . . . आज संपूर्ण मार्ग चालताना डोक्यामध्ये फक्त मराठ्यांचा तेजस्वी ,देदीप्यमान इतिहास निनादत होता . असे वाटायचे की क्षणात डावीकडून हजार एक घोडदळ येईल आणि एखादा मावळा जाता जाता मला म्हणेल , " नर्मदे हर बाबाजी ! ही घ्या साखर ! तोंड गोड करा ! आपला भगवा झेंडा अटकच्या किल्ल्यावर फडकला आहे ! " आणि बघता बघता ते सर्व घोडे चब डब चब डब आवाज करत नर्मदेच्या लाटा चिरत पैलतीर गाठतील आणि वेगाने उत्तरेकडे रवाना होतील !  धर्मवीर बलिदान मास सुरू होता . छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदानामुळे पेटून उठलेल्या मराठा सैन्याने उभा आडवा हिंदुस्तान एक करून टाकला ! त्यांच्या चरण धुळीने पावन झालेला हा परिसर होता ! ही फौज काही पगारी सैनिकांची नव्हती . इथे स्वतःची पैरण , स्वतःचा घोडा , स्वतःची ढाल , स्वतःची तलवार आणि स्वतःची भाकरी घेऊन येणारा मावळा स्वतःच्या जीवाची बाजी एका महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी लावत असे .हे महान स्वप्न , ही जाज्वल्य निष्ठा , हे अद्वितीय साहस ,हा अतुलनीय पराक्रम , हे असामान्य शौर्य त्यांच्या हृदयानंतर्यामी निर्माण करणाऱ्या सर्वच प्रातःस्मरणीय परमेश्वरी अंशांना साष्टांग नमस्कार करता झालो . तिथली चिमूटभर माती घेऊन जिभेवर टाकली . न जाणो कोण्या एखाद्या अणू रेणू मधून राष्ट्रनिष्ठेसाठी धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या स्वेदबिंदूचा अंश किंवा रक्ताच्या सांडलेल्या थेंबातला बाणेदार पणा माझ्या शरीरात जाऊन गुणसूत्रांमध्ये घुसावा .  बाजीराव पेशवा यांची समाधी जसजशी जवळ जवळ येऊ लागली तस तसा माझ्या अश्रूंचा बांध रोखून धरणे मला अवघड होऊ लागले . कोण कुठले दक्षिणेतल्या बादशहाचे सरदार ! त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो काय , आणि साऱ्या भारत वर्षाचे भाग्य पुन्हा बदलून टाकतो काय ! ठरवले असते तर आयुष्यभर महालामध्ये बसून आयुष्य ऐशो आरामात जगता आले असते .परंतु ते सहज प्राप्त आयुष्य नाकारून स्वतःच्या तलवारीने स्वतःच्या धर्माधिष्ठित राज्याच्या सीमा आखणारा लोकोत्तर पुण्य पुरुष म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ! त्यांच्या उपदेशाला अनुसरून ह्या राज्याचा कैकपटीने विस्तार करणारे त्यांचे अतिपराक्रमी पुत्रोत्तम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ! आणि त्यांच्या अपूर्ण मनीषा पूर्ण करण्यासाठी अखंड हिंदुस्थानात घोड्यावर स्वाऱ्या करून उभा आडवा हिंदुस्तान पुन्हा एका सूत्रात बांधणारा महापराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा ! ज्याने आयुष्यामध्ये झोपेत सुद्धा वेळ वाया घालवला नाही असा बाजीराव ! असे म्हणतात की बाजीराव दोन घोडे घेऊन चालायचा त्यातील एका घोड्यावर तो झोपत असे आणि दुसरा घोडा पहिल्या घोड्याला मार्ग दाखवत असे . इतका भीमा पराक्रम गाजविणारा हा महायोद्धा इथे चिरनिद्रिस्त झाला आहे या नुसत्या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येत होता . ब्रह्मदेश ते बलुचिस्तान आणि काश्मीर ते कन्याकुमारी देश एका सूत्रामध्ये बांधला तो या महान योद्धा परंपरेने .  इतिहास साक्षीला आहे की जेव्हा जेव्हा आपण हत्यार खाली ठेवले तेव्हा तेव्हा आपल्या देशाचा एक एक भूभाग गमावला आहे . आणि अजूनही आपण इतिहासातून बोध घेऊन शहाणे झालो नाही तर भविष्यामध्ये कदाचित परदेशाचा विसा घेऊन नर्मदा परिक्रमा करावी लागेल .जास्त जुना काळ नाही , केवळ ७५ वर्षांपूर्वी सिंधू काठी राहणारे हिंदू देखील असे सिंधू नदीच्या बाबतीत सांगितल्यावर विनोद समजून हसत होते ! आज आपल्याला सिंधू नदी पाहण्यासाठी पाकिस्तान देशाचा विसा घेऊन जावे लागते . आणि माझ्या उभ्या आयुष्यात मी एकही मनुष्य असा पाहिला नाही की ज्याने खास सिंधू नदीचे दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली आहे . अजून शंभर दोनशे वर्षांनी कदाचित कैलास मानसरोवर यात्रेला हिंदू जाणे बंद करतील . आजच तुम्ही गुगल नकाशावर शोधायला गेलात तर कैलास आणि मानसरोवराची नावे बदललेली आपल्याला दिसतात . एक समाज म्हणून आपण षंढ आहोत त्याची ही परिणती आहे . षंढ माणूस जास्त अपेक्षा ठेवत नसतो . त्याला फक्त दोन वेळचे भोजन मिळाले तरी पुरेसे असते . मी स्वतः गुगल कंपनीला पत्रव्यवहार करून कळविले होते की त्यांनी कैलास मानसरोवर आणि राक्षस ताल ही नावे बदलली नाही पाहिजेत . परंतु त्यांनी मला असे कळविले होते की दोन्ही देशांची ह्या भूभागाच्या मालकीबद्दल सहमती झालेली असल्यामुळे तुमच्या माझ्या मताला काही किंमत राहत नाही . गंमत म्हणजे आजपर्यंत कोणीही मोठ्या संख्येने असा आक्षेप गुगल नकाशावर नोंदवलेला नाही . कारण तो आपला प्रांत आहे तो आपला भूभाग आहे तिथे आपली संस्कृती कधीकाळी नांदत होती याची जाणीवच हिंदू समाजाला नाही . अशा रीतीने शतखंडित झालेला भारत वर्ष , त्याला आज तो ज्या आकारात दिसतो तो आकार देणारा बाजीराव पेशवा ! आणि तेजस्वी मराठेशाहीची परंपरा ! सारेच आज डोक्यामध्ये वादळासारखे घोंगावत होते . ग्वाल्हेर चे शिंदे , बडोद्याचे गायकवाड ,धार चे पवार , इंदोरचे होळकर , नागपूरचे भोसले , पुण्याचे पेशवे सर्वांनी एक दिलाने , एकजुटीने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले . आपली जात पात पंथ भेद विसरून सर्व बलुतेदार त्यांच्या या महान राष्ट्र यज्ञामध्ये आहुती म्हणून सामील झाले . त्या महानतम त्यागाच्या विभूतीवर आज आपले राष्ट्र उभे आहे . बघता बघता समोर भव्य तटबंदी दिसू लागली . मध्यप्रदेश सरकारने उत्तम पैकी खर्च करून मजबूत काँक्रीटीकरण करीत या समाधी स्थळावर महापुराचा कमीत कमी प्रभाव पडेल अशी व्यवस्था केलेली दिसते . पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि महाद्वारापाशी येऊन उभा राहिलो .  साधारण चौरसाकृती वाटणारे भव्य दिव्य प्रवेशद्वार या वाड्याला आहे . बाहेर एका मोठ्या झाडाचा पार होता . आत मध्ये गेल्यावर उजव्या हाताला श्रीमंत बाजीराव पेशवा यांची समाधी आहे . समाधीवर डोके टेकले आणि अश्रूंनी समाधीला अभिषेक घातला . मला असे फार वाटते की कुठल्यातरी एका जन्मामध्ये मी या सैन्याचे घोडे सांभाळण्याचे काम करत असणार . किमान त्यांची धुणी धुण्याचे किंवा पायताणे पुसण्याचे काम नक्की करत असणार . माझ्या मागोमाग सात्यकी देखील आत मध्ये आला . एका जुनाट पडक्या वास्तू कडे पाहून मी इतका ढसाढसा का रडतो आहे याचा बोध त्याला होत नव्हता . होणे शक्य देखील नव्हते . आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत . संस्कार हा रक्तातून यावा लागतो . महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसांना रक्तातून मिळालेला जो काही वारसा आहे तो अन्य प्रांतातील लोकांना मिळण्याची शक्यताच नाही . महाराष्ट्र भारतातील एक अग्रेसर राज्य असण्याचे एकमेव कारण हा उदात्त वारसा आहे .  बाकी काही नाही . या भागाचे दर्शन आपल्याला घडवतो . ज्याप्रमाणे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किंवा वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी  ही स्थाने हिंदूंसाठी ज्योतिर्लिंगाप्रमाणे पूज्य आहेत तशीच ही समाधी देखील आहे . 

नदीपात्रातून चालत आल्यावर समोर अशी मजबूत धारक भिंत आणि त्यावर बाजीराव पेशवा यांची समाधी दिसते .

समाधी पर्यंत येण्याचा काठावरील मार्ग असा आहे

रावेर आणि खेडी अशी दोन वेगळी गावे असून ही समाधी खेडी गावात आहे . रावेर खेडी म्हणजे रावाची खेडी . अर्थात बाजीरावाची खेडी .

अतिशय मजबूत तटबंदीने बंदिस्त अशा एका छोटेखानी किल्ल्यामध्ये ही समाधी आहे .

समाधी स्थळाचे महाद्वार छोटेसे परंतु आकर्षक आहे

संपूर्ण दगडामध्ये केलेले हे बांधकाम अतिशय सुबक आणि भरभक्कम आहे .

समाधी स्थळाच्या बाहेर एक मोठा पिंपळाचा वृक्ष असून त्याचा मोठा पार आहे . तसेच इथे समोर नर्मदा पात्रामध्ये एक मोठे बेट असून नर्मदा दोन शाखांमध्ये विभागून इथे वाहताना दिसते .

श्रीमंत बाजीराव पेशवा यांची हीच ती समाधी

समाधी

समाधी मंदिरातून नर्मदा मातेचे अतिशय सुंदर दर्शन होते . समोर दिसत आहे तो नर्मदेचा पहिला तीर नसून नर्मदे मधील एक मोठे बेट आहे . या बेटाच्या पलीकडून अजून एक शाखा वाहत आहे . इथे बसून राहायला खूप भारी वाटते .

समाधीस्थळाबाहेर लावलेली माहिती

भारतीय पुरातत्व विभागाने लावलेल्या पाट्या

तटबंदीच्या भिंतीवर चढण्याचा मार्ग

महापुरामध्ये ही समाधी जलमग्न होते .

बाजीरावांच्या पत्नी काशीबाई पेशवा यांची समाधी देखील समोरच एका टेकडीवर आहे

कळस जागेवर नसलेलं अत्यंत मोडकळीला आलेलं एक शिवमंदिर असं त्या समाधीचं स्वरूप आहे

मंदिर छोटेसेच असले तरी मराठा स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे .

या समाधी परिसरामध्ये येण्यापूर्वी मी एक अद्भुत घटना अनुभवली होती . भरपूर चालून उष्णता निर्माण झाल्यामुळे अभी मैया मध्ये स्नान करावे असा विचार करून मी एके ठिकाणी स्नानाला उतरलो . मला एक सवय आहे की स्नानाला उतरल्यावर आजूबाजूला काय काय आहे ते पाहून ठेवायचे . माझ्या आजूबाजूला तीन बाजूंनी दगडांची गुळगुळीत झालेली टोके दिसत होती . मी तीन डुबक्या मारून वर आलो आणि आजूबाजूला पाहिले तर ते सर्व दगड गायब झालेले होते . मग मी काठावर असलेल्या एका दगडाकडे लक्ष ठेवले . थोड्या वेळात तो दगड देखील अदृश्य झाला . मग माझ्या लक्षात आले की धरणातून पाणी सोडल्यामुळे नर्मदेची पातळी वेगाने वाढत आहे ! त्यामुळे मी चटकन पाण्यातून बाहेर आलो . माझी झोळी जी मी नर्मदेपासून वीस फूट लांब ठेवली होती ती आता फक्त पाच फुटावर आली होती ! म्हणजे अजून थोडा वेळ जर मी पाण्यात राहिलो असतो तर कदाचित ती वाहून गेली असती ! पाण्याची पातळी किती वेगाने वाढू शकते हे मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले ! गंमत म्हणजे ही पातळी वाढते आहे तुमच्या लक्षात येत नाही ! एका स्थिर गतीने पाण्याची पातळी वाढत जाते . तशीच ती कालांतराने कमी देखील होत जाते . पातळी कमी जास्त झाल्यामुळे जलव्याप्त होणारा परिसर हा शक्यतो चालण्यासाठी उत्तम ठरतो . कारण इथे फारशी झाडे उगवत नाहीत .

इथून थोडेसे पुढे आल्यावर बिबट्याने मारलेली एक गाय मला पाहायला मिळाली . एका गुराख्याने मला सांगितले की बिबट्याने ही गाय मारली आहे . अशा जनावरांपासून आपण थोडेसे लांबच चालावे . कारण जवळपास हिंस्त्र श्वापद असेल तर त्याला अशी भीती असते की तुम्ही त्याचे खाद्य पळवून न्यायला आलेले आहात . आणि त्या भीतीपोटी तुमच्यावर ते हल्ला करू शकते . रावेर खेडी मध्ये आल्यावर काशीबाई साहेबांच्या समाधी शेजारी एक छोटासा आश्रम होता तिथे परिक्रमा वासी उतरतात असे मला सांगण्यात आले . यापूर्वी सकाळी घडलेला एक प्रसंग चांगला धडा शिकवून गेला . आश्रमामध्ये गेल्यावर भोजनप्रसाद तयार होता आणि लोक जेवायला बसलेले होते . परंतु इथे राहणाऱ्या वानप्रस्थाश्रमी साधूने सांगितले की तुम्ही येण्यासाठी पाच मिनिटे उशीर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला भोजन प्रसाद देणार नाही . आमच्यासमोर सर्वजण जेवले परंतु आम्हाला भोजन मिळाले नाही . आम्ही म्हणजे माझ्यापाठोपाठ आलेला छोटा बंगाली सुद्धा . त्याला या प्रकाराचा खूप राग आला . परंतु मी विचार करू लागलो की असे कसे काय झाले असेल आणि मग मला सकाळचा प्रसंग आठवला . सकाळी आम्ही दोघे चालत असताना एका नावाने आम्हाला थांबविले आणि त्याच्या घरी चहा पिण्यासाठी यायची विनंती केली . मी तयार झालो होतो परंतु छोटा बंगाली म्हणाला आपण आत्ता थांबलो तर दिवसा चालणे होत नाही त्यापेक्षा पुढे निघून जाऊ . मी देखील त्याला होकार दिला होता आणि आम्ही दोघे त्या नावाड्याचे मन दुखवून पुढे निघून गेलो होतो . परिक्रमेमध्ये मिळणारे महत्त्वाचे धडे असे असतात . धडा क्रमांक एक सोबत कोणालाही घेऊ नका एकटेच चाला !

धडा क्रमांक दोन कोणीही काहीही दिले तर त्याला नाही म्हणू नका . मैय्याला असे प्रकार केलेले आवडत नाहीत . समोर जेवण असून उपाशी राहण्याची वेळ त्या दिवशी आमच्यावर आली . अखेरीस तो परिसर पुन्हा एकदा नीट पाहावा म्हणून मी बाहेर पडलो . काशीबाई यांच्या समाधी स्थळी रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे . दक्षिण भारतातील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र कायम मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले होते . इथे एकूण बारा पुजारी आहेत जे सर्व मराठी आहेत . यांच्या नेमणुका रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत . कर्वे , बर्वे ,बोकील ,अष्टपुत्रे , दशपुत्रे , रानडे अशी आडनाव असलेले हे सर्व गुरुजी आहेत . यातील बोकील हे रामेश्वरम मठाचे रामदासी मठपती आहेत . भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाव रामनाथ हे रामेश्वराच्या शिवलिंगावरूनच ठेवलेले आहे . दलित समाजातील रामनाथ कोविंद हे परम शिवभक्त आहेत . ते जेव्हा रामानाथाची पूजा करण्याकरता गाभाऱ्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत विजयकुमार बोकील हे रामेश्वराचे मुख्य पुजारी तिथे होते . सांगायचे तात्पर्य रामेश्वराचा आणि मराठी शाही चा जुना संबंध आहे . त्यामुळे हे शिवलिंग मुख्य रामेश्वराला स्पर्श करून आणले असण्याची शक्यता आहे . इथे बसून माझी सर्व शिवाची स्तवने मी म्हणू लागलो . इतक्यात मंदिरामध्ये अनेक स्त्रिया येत आहेत असे माझ्या लक्षात आले . सर्वांच्या हातामध्ये दुधाची वाटी होती . आणि त्या सर्वजणी मिळून बाहेरच्या नंदीला दूध पाजत होत्या . मी लहान असताना एकदा गणपती दूध पीत आहे अशी अफवा महाराष्ट्र मध्ये पसरली होती . अगदी त्याच धर्तीवर नंदिकेश्वर भगवान दूध पीत आहेत अशी अफवा त्या दिवशी मध्य प्रदेशांमध्ये प्रस्रुत झाली होती . अगदी तरुण मुली सुद्धा वेड्यासारखे नंदीला दूध पाजत होत्या . मी त्या सर्वांना सरफेस टेन्शन म्हणजे काय असते आणि त्या पृष्ठभागीय तणावामुळे कुठलाही द्रव पदार्थ कसा खाली येऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले . केवळ मंदिर नव्हे तर कुठलाही दगड दुध पिऊ शकतो हे देखील त्यांना करून दाखवले . परंतु कोणीही माझे सांगणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . उलट मलाच त्यांच्या नेमाडी भाषेमध्ये उलटेपालटे काहीतरी बायका बोलू लागल्या . हा पाखंडी बाबा आहे याला धर्माचे काही ज्ञान नाही वगैरे वगैरे त्या बडबडत होत्या . मी त्या सर्वांना आव्हान दिले आणि नंदीला अजून बरेच पदार्थ पाजून दाखवले . परंतु त्या बायका काही मान्य करेनात . अखेरीस मी त्या सर्वांचा नाद सोडून दिला आणि बाजीरावाची समाधी गाठली . इथे डावीकडे आत मध्ये गेल्यावर एका कोपऱ्यात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय असून येथे चौधरी नामक एक पुरातत्त्ववेत्ता मनुष्य मला भेटला . याने मला खूप सहकार्य केले आणि संपूर्ण परिसराची चांगली माहिती दिली . तसेच या भागामध्ये राहणारा एक तरुण खूप चांगला गाईड म्हणून काम करतो असे सांगून खेडी गावातून त्याला फोन करून बोलावून घेतले . अनिल रामलाल बिर्ला नावाचा मोराण्या गुर्जर जातीचा हा ३५ - ४० वर्षाचा तरुण होता . याला मी आल्या आल्या नमस्कार केला आणि समाधी विषयी माहिती विचारली . मला असे लक्षात आले की याला बाजीरावा पेक्षा स्वतःबद्दल बोलण्यात अधिक रस होता .त्याचे युट्यूब व्हिडिओ कसे हिट आहेत आणि त्यावर तो कशी माहिती सांगतो वगैरे मला तो सांगू लागला . मी त्याला सांगितले की माझ्याकडे फोन नाही तरी कृपया मला तू आत्ता माहिती दे तो मला म्हणाला अशी प्रत्येकाला माहिती देत बसलो तर मग माझे व्हिडिओ कोण बघणार ! मी काही त्याचे व्हिडिओ पाहिले नाहीत परंतु मला खात्री आहे की हे व्हिडिओ देखील अर्धवट ज्ञानाने परिपूर्ण असणार आहेत ! कारण मुळात बाजीराव पेशवा या व्यक्तीबद्दल याच्या अंतकरणात फारसा कळवळा नाही असे मला जाणवले . तो तसा असता तर त्याने ताबडतोब मला सर्व माहिती सांगितली असती . त्याचे अजून एक वाक्य मला खटकले . किमान २५ - ३० लोक असल्याशिवाय मी माझे तोंड उघडत नाही असे तो म्हणाला ! हे ऐकून मला अजूनच वाईट वाटले . संख्यात्मक आणि गुणात्मक धारणा शक्ती याबाबत त्याचा अभ्यास अजून अपूर्ण होता . तो आल्यावर बरेच काही बोलला परंतु त्यात आत्मप्रशस्ती जास्त होती . तरीदेखील त्याला गाईड म्हणून फायदा व्हावा असे काही त्याला ज्ञान द्यावे असा विचार करून मला जो काही मराठीशाहीचा इतिहास माहिती होता तितका मी त्याच्या डोक्यात कोंबला . त्याने अजून एक गंमत केली ती म्हणजे तो मला म्हणाला की माझे नाव सांगा वरच्या आश्रमामध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील ! मी गंमत म्हणून वरती गेल्यावर जेव्हा याचे नाव आश्रमात सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलेकी तुम्ही आधीच आसन लावले आहे म्हणून ठीक आहे .नाहीतर या माणसाचे नाव सांगितल्यावर तुम्हाला आसन लावायला सुद्धा परवानगी दिली नसती ! असो हे सर्व सांगण्यामागे उद्देश इतकाच आहे की जे कोणी तरुण हे लेखन वाचत असतील त्यांनी लक्षात घ्यावे . प्रसिद्धीच्या मागे कधीही लागू नये . तुमच्याकडे सिद्धी आली की प्रसिद्धी येतेच . परंतु अर्धवट ज्ञानाचा अहंकार करीत आपली स्वतःची टिमकी वाजवत फिरू लागल्यावर समाजामध्ये आपले मूल शून्यवत होते . आज या युवकाला खूप चांगली संधी प्राप्त झालेली असून देखील लाईक शेअर सबस्क्राईबच्या दृष्ट चक्रात अडकल्यामुळे तो एका चांगल्या ज्ञान आदान प्रदानाला मुकला . मी त्याला विचारले सुद्धा की तू फोन केल्यावर लगेच कसा काय आलास ? तेव्हा त्याने त्याची खरी अपेक्षा सांगून टाकली . चौधरी ने त्याला फोनवर सांगितले की इथे एक इतिहास अभ्यासक आलेले आहेत त्यामुळे तो डोक्यामध्ये एक प्रतिमा घेऊन आला होता . सुटा बुटातील चकाचक दिसणारा एखादा विचारवंत समोर येईल असे कदाचित त्याला वाटले असावे आणि समोर माझ्यासारखा फाटका मळकट कळकट इसम पाहिल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला . त्यात त्याला असे वाटले होते की माझे यूट्यूब चैनल असेल , इंस्टाग्राम असेल ,फेसबुक असेल आणि मी 'कोलॅबोरेशन ' करून ह्याला माझ्या संपर्कांमध्ये प्रसिद्धी देईन आणि त्याचे सबस्क्राईबर वाढवीन . प्रत्यक्षात मी मोबाईल वापरत नाही हे पाहिल्यावर त्याने अक्षरशः मला कटवले . मी एका प्रामाणिक आंतर यात्रेवर निघालेला असल्यामुळे , त्याने जर पोट तिडकीने मला मराठ्यांचा इतिहास सांगितला असता तर त्याचे तोंड भरून कौतुक माझ्या डायरीमध्ये मी लिहिले असते . परंतु त्याच्या नशिबात ते नव्हते . माझ्यापेक्षा छोटा बंगाली थोडा चकाचक राहत असल्यामुळे त्याच्याशी मात्र तो फार आदराने वागत होता ! मला या अनिल रामलाल बिर्लाची फारच मजा वाटली ! मी त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्याने मला धड उत्तर दिले नाही . प्रत्येक वेळी तो माझे यूट्यूब चैनल बघा एवढेच सांगत राहिला . शेवटी मी त्याला म्हणालो देखील की तुझी ही आयडिया मला आधी कळली असती तर मी youtube वरच परिक्रमा केली असती , उगाचच प्रत्यक्षात देह जाळून घेतला ! हे ऐकल्यावर तो खजील झाला आणि निघून गेला .

अनिल बिर्ला याच्या हृदयामध्ये बाजीराव पेशवा यांच्या बद्दल भक्ती आहे हे नि:संशय ! कारण त्याच्या मुलाचे नावच त्याने बाजीराव बिर्ला  ठेवले आहे ! फक्त त्याने प्रत्यक्ष माहिती देण्यावर अधिक भर द्यावा अशी त्याला या माध्यमातून विनंती आहे ! युट्युब वरच्या रेसिपी बघून जसे पोट भरत नाही त्यासाठी प्रत्यक्ष जेवावे लागते तसेच काहीसे हे आहे . असो .

अनिल रामलाल बिर्ला आणि त्याचे युट्युब चॅनेल

मी रामेश्वरम मंदिरापाशी बसलेलो असताना एक अतिशय तेजस्वी तरुण तिथे आला . आणि माझ्याशी बोलू लागला . याचे डोळे घारे होते .रंग गोरा होता .उंची चांगली होती . राजबिंडे व्यक्तिमत्व होते . याचे नाव होते धरमसिंह नवलसिंह पवार ! जातिवंत मराठा ! परंतु मूळ पवार लोकांप्रमाणे हे घराणे देखील उत्तर भारतातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेले होते . याच्यासोबत मी किमान सहा तास गप्पा मारल्या असतील ! हा माझा पिच्छाच सोडेना ! याचे नवीन नवीन लग्न झाले होते त्यामुळे बायको सारखा फोन करत होती ! परंतु हा काही घरी गेला नाही . अखेरीस रात्री माझ्यासोबत भोजन केल्यावरच तो घरी गेला . हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . याने मात्र या परिसराची अतिशय  इत्यंभूत माहिती मला सांगितली . आमच्या दोघांची अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली . अनिल बिर्ला याला संघाच्या कामात ओढावे असे मी त्याला सुचविले . जेणेकरून त्याची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल . त्या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या कट्ट्यांवर बसून आम्ही चालता चालता बोलत होतो . जणू काही आम्ही जुने मित्र असावे असा आमचा भाव होता ! त्याला देखील मला भेटून खूप आनंद झाला ! त्यावेळी त्याने काढलेले काही फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . ते सोबत जोडत आहे . 

रावेर खेडी येथील सूर्यास्त अनुभवताना धरम सिंह पवार या तरुणासोबत प्रस्तुत लेखक

याची वाणी अतिशय तेजस्वी होती आणि एकंदरीतच चेहऱ्यावर खूप तेज होते . शुद्ध धारच्या पवार घराण्याचे बीज होते .

रामेश्वरम मंदिरा सोबत आम्ही काढलेला फोटो . नुकतीच शिवरात्र होऊन गेल्यामुळे त्याची सजावट शिल्लक होती .मागे स्त्रियांचा नंदीला दूध पाजण्याचा कार्यक्रम चालूच आहे !

माझा मळलेला वेश पहा !

 रेवा तटीची माती , तीच मजला विभूती !

अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत आम्ही किनाऱ्यावर चकरा मारत होतो .  असे आश्वासक तरुण देखील याच मातीमध्ये निर्माण होत आहेत तोपर्यंत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे . 

काठावरून एक गमतीशीर गोष्ट मी पाहिली . दुपारी मी जेव्हा इथे आलो तेव्हा एका बाईने आपली गाई गुरे नर्मदेमध्ये हाकलली . इथे पाण्याला प्रचंड प्रवाह आहे  तरीदेखील ती सर्व जनावरे सराईतपणे पोहत मधल्या बेटावर गेली . बेटावर असलेले हिरवेगार गवत दिवसभर त्यांनी खाल्ले आणि संध्याकाळी हिने खालून आवाज दिल्याबरोबर सर्वजण पुन्हा माघारी आले ! प्रवाहाला वेग असल्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला सर्व गुरे पोहत होती . अगदी लहान वासरे सुद्धा पोहत पोहत काठावर आली . मी या मातारामशी संवाद साधला आणि तिच्याकडून ही संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली . गेल्या अनेक पिढ्या ही गुरे अशा पद्धतीने नर्मदेच्या मधोमध जाऊन परत येत आहेत . ही सवय त्यांच्या रक्ता मधून पुढच्या पिढीमध्ये जाते कारण नवीन गुरे आणल्यावर अशा पद्धतीने पाण्यामध्ये उतरत नाहीत असे तिने सांगितले . गेल्या अनेक पिढ्या हा कळप मधल्या बेटावर जाऊन पुन्हा परत पोहत येत आहे . यात एकदा वर पोहोचलेली गुरे अन्य गुरांना सहकार्य करतात हे देखील मी पाहिले . गुराखी आणि गुरे यांचे हे असामान्य साहस मला फार आवडले ! किमान पक्षी बाजीराव सारख्या महायोद्ध्याच्या समाधीपुढे असे काहीतरी पराक्रमपूर्ण नक्कीच होऊ शकते ! 

आम्हाला दुपारी उपाशी मारणारा म्हातारा हा प्रत्यक्षात रावेरखेडी मध्ये राहणारा एका टेन्ट हाऊसचा मालक होता . टेन्ट हाऊस म्हणजे मांडवाला . त्याची ही पाचवी परिक्रमा सुरू होती . आणि त्याने रात्री आमची क्षमा मागितली आणि सांगितले की मैयाने प्रेरणा दिल्यामुळे त्याने आम्हाला उपाशी मारले . मी देखील त्याला मग नावाड्याचा चहा नाकारण्याचा प्रसंग सांगितला आणि त्यांनी योग्यच केल्याचे सांगितले .  रात्री उशिरा गृहस्थाची कर्तव्ये या विषयावर धरमसिंह पवार शी गप्पा मारून आता त्याचे प्रात्यक्षिक करावे ,अर्थात कुटुंबाला नदेखील पुरेसा वेळ द्यावा असे सांगत त्याला रजा दिली . सकाळी लवकर उठून आन्हिकं आटोपून किनाऱ्याने पुढे निघालो . छोटा बंगाली दगड धोंड्यामध्ये मार्ग काढून वैतागला होता त्यामुळे त्याने डांबरी रस्त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला ! सुंठी वाचून खोकला गेला !  

इथून पुढे बकावा गावामध्ये  जाताना मध्ये खडक किंवा

बाकुंड नावाची एक नदी लागते . हिच्या पाण्याला गती खूप आहे .  पाणी अतिशय स्वच्छ आणि गोड आहे . धोकादायक खडकांवरून ही नदी सावकाश पार केली . इतक्यात पुढे रस्ता नसल्यामुळे बंगाली बाबू देखील इकडे येताना दिसला . त्याला देखील नदी पार करवली . इथे मिलन प्रधान या ओडिया परिक्रमावासीचे बूट फाटले . त्याची नवी नवी परिक्रमा असल्यामुळे त्याला अनवाणी चालता येणे अवघड होते . केवळ पायात बूट नाहीत म्हणून त्याने परिक्रमा अर्धवट सोडू नये म्हणून मी माझी चप्पल त्याला देऊन टाकली . लोफर्स प्रकारची ती चप्पल त्याला बसली . आणि मी पुढे अनवाणी प्रवास सुरू केला . बकावा गावाच्या अलीकडे पासून मोठ्या प्रमाणात दगड पात्रामध्ये दिसू लागले . हे दगड इतके होते की त्यांची संख्या कित्येक कोटी भरावी ! लहान मोठे विविध आकाराचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी दगड होते . इथे अशा पद्धतीचे दगड गोळा करून ते शिवलिंग बनवणाऱ्या कारागिरांना आणून देणे हा एक व्यवसाय आहे . काठाकाठाने मी चाललो होतो . एका नावे मध्ये काही लोक चढत होते . इतक्यात त्या नावेतून नर्मदे हर असा जोरात पुकारा एकाने केला ! बघतो तर ते होते रमेश जाधव ! उत्तर तटावर मी असताना दमगड इथल्या रामकुटी मध्ये मला जे चौघे भेटले होते त्यातील बकावा गावचा हाच तो परिक्रमावासी ! त्यावेळी तो मला म्हणाला होता की तुमच्याकडे फोन नाही मग तुम्हाला संपर्क कसा करू ? तुम्हाला संपूर्ण बकावा गाव मला फिरवून दाखवायचे आहे . आणि मी त्याला म्हणालो होतो की मैयाची इच्छा असेल तर आपली भेट नक्की होईल . प्रत्यक्षामध्ये हा दोन दिवसासाठी शिवलिंगे गोळा करायला म्हणून दूरच्या घाटावर निघाला होता . परंतु मला पाहिल्यावर तो थांबला आणि नाव त्याने सोडून दिली . तो म्हणाला आजचा दिवस तुमच्यासाठी राखीव ठेवला आहे ! आज संपूर्ण बकावा गाव मी तुम्हाला दाखवतो ! आणि उद्या माझ्या प्रवासाला जातो . बकावा या गावाविषयी थोडेसे सांगतो .

नर्मदा खंडामध्ये एक म्हण प्रचलित आहे . नर्मदा मैया का हर कंकर शंकर होता है । कंकर म्हणजे दगड . नर्मदा नदीमध्ये सापडणारा प्रत्येक दगड हा साक्षात शंकराचा अवतार मानला जातो . त्यामुळे मंदिरामध्ये त्याची वेगळी प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही . फक्त आणून त्याला स्थानापन्न केले की झाले ! पूर्वी नर्मदा नदीमध्ये अगदी शिवलिंगाच्या आकाराचे दगड मिळायचे . परंतु लाखो लोकांनी ते दगड उचलल्यामुळे तसेच महापुरामध्ये ते दगड वाहून गेल्यामुळे तसेच विविध ठिकाणी झालेल्या धरणामुळे आता ते पूर्वी इतक्या संख्येने सापडत नाहीत . परंतु तरीदेखील कोट्यावधी शिवलिंगे आपल्या आजूबाजूला पडलेली आपल्याला दिसतात . बकावा या गावांमध्ये एक असा व्यवसाय निर्माण झालेला आहे की हे लोक विविध रंगी दगड गोळा करून आणतात आणि त्याला यंत्राच्या साह्याने किंवा छीन्नी हातोडीच्या सहाय्याने शिवलिंगाचा आकार देऊन ती शिवलिंगे विकतात . हा आकार देताना कुठल्याही फुटपट्टीचा किंवा मोजपट्टीचा वापर केला जात नाही . केवळ नजरेच्या अंदाजाने शिवलिंग बनवले जाते हे विशेष ! आणि या शिवलिंगामध्ये कुठेही समतोल ढळलेला नसतो हे त्याहून विशेष ! लांबी रुंदी उंची सर्व यथासांग असते ! हे किती मोठे आश्चर्य आहे विचार करून पहा ! मुळात गोल आकार बनवणे अवघड आहे त्यात पॅराबोला अर्थात लंबगोल बनवणे अजून अवघड आहे . तू अचूक बनवण्याचे काम इथले कारागीर करतात . संपूर्ण गावामध्ये कुठेही जा तुम्हाला धुळीचे साम्राज्य दिसते आणि दगडावर हातोडीचे घाव पडल्याचे आवाज आणि विविध विद्युत यंत्रांचे कर्णकर्कश्श आवाज सर्वत्र घुमत असतात . सुपारी पासून ते साठ फुटाच्या आकारापर्यंतची शिवलिंगे येथे बनवली जातात .  एका मुठीत अनेक मावतील अशी शिवलिंगे सुद्धा इथेच मिळतात . आणि जे हलवायला चार क्रेन ची मदत घ्यावी लागते अशी शिवलिंगे सुद्धा इथेच बनतात !

अशी शिवलिंगे विकणारी शब्दशः हजारो दुकाने या गावात आहेत

काही लोक रस्त्यावर शिवलिंगे विकतात तर मोठे दुकानदार मॉल प्रमाणे शिवलिंगे विकण्याची दुकाने थाटून बसलेले आहेत .

या शिवलिंगांमध्ये अनेक प्रकार असतात .एकाच दगडाची शिवलिंगे किंवा विविध रंग एकाच दगडामध्ये असणारी शिवलिंगे किंवा दोन स्पष्ट रंग असणारी अर्धनारी नटेश्वरासारखी शिवलिंगे किंवा ओम असा आकार उठलेली ओंकारेश्वर शिवलिंगे किंवा त्रिशूलाचा आकार उठलेली शिवलिंगे किंवा भस्म त्रिपुण्ड्र आकार असलेली शिवलिंगे किंवा ब्रह्मांड आकृती असलेली शिवलिंगे किंवा जनेऊ अथवा जानवेधारी शिवलिंगे किंवा आत्मलिंगे असे अनेक प्रकार आहेत . शिवलिंगावर कुठला आकार उठला आहे त्यानुसार त्याची किंमत बदलते . रमेश जाधव ने मला हळूहळू एकेका ठिकाणी न्यायला सुरुवात केली . त्याचा ह्या शास्त्राचा बालपणापासून अभ्यास होता . कुठल्या प्रकारचा दगड कुठे सापडतो याची त्याला चांगली कल्पना असते . आपल्याकडे आलेल्या ग्राहकाची गरज ते आधी समजावून घेतात आणि त्यानुसार ग्राहकाला सोबत घेऊन नावेतून दगड शोधण्याकरता जातात . एकदा त्यांना सापडलेला दगड ते एका बाजूला काढून ठेवतात आणि त्या दगडाला अन्य कोणीही हात लावत नाही . चुकून कोणी हात लावलास तर लगेच त्यांना आपला दगड कुठला होता हे लक्षात येते . अशा पद्धतीने एकाच वेळी सुमारे पाच ते दहा हजार दगडांचे आकार आणि प्रकार त्याच्या डोक्यामध्ये असतात . एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरेल एवढे दगड गोळा झाले की ट्रॅक्टर मागविला जातो आणि ते सर्व दगड कारखान्याला विकले जातात . ट्रॉली चा दर अतिशय कमी असतो . परंतु ओम स्वस्तिक वगैरे आकार उठलेले शिवलिंग सापडले तर त्याची मात्र तोंडी बोली लावली जाते . फार क्वचित तयार शिवलिंग देखील सापडते त्याची किंमत सर्वात जास्त असते . कारण ते स्वतः नर्मदा मातेने तयार केलेले असते . रमेश जाधव ला मी आल्यामुळे प्रचंड आनंद झाला होता आणि मला काय दाखवू आणि काय नाही असे त्याला झाले होते ! गावामध्ये एक छोटेसे राधाकृष्ण मंदिर होते तिथे सामान ठेवायला त्याने मला सांगितले . या मंदिरामध्ये जालना जिल्ह्यातील परतुर येथे राहणाऱ्या गयाबाई नावाच्या संत आहेत त्यांच्यासारखा दिसणारा एक साधू होता . हा अतिशय हुशार आणि कलाकार मनुष्य होता . तिची चित्रकला विणकाम वगैरे सर्व अप्रतिम होते . सामान सुरक्षित आहे तू बिनधास्त सर्व गाव बघून ये असे त्यांनी मला आश्वासन दिले . भार हलका झाल्यामुळे बरे वाटले .सोबत नर्मदा मैयाची कुपी ठेवलेली पिशवी घेतली आणि निघालो . प्रत्येक घरामध्ये शिवलिंगे बनविण्याचे काम चालू होते . कोणीही नाकाला मास्क वगैरे लावलेला नव्हता . रमेश जाधव ने मला सांगितले की इथे होणारा प्रत्येक मृत्यू हा दमा रोगामुळेच होतो . इथे प्रत्येक लहान मोठ्या माणसाला दम्याचा त्रास आहे . आपल्या फुफुसाची रचना अशी असते की त्यामध्ये एकदा आत मध्ये गेलेली वस्तू पुन्हा मरेपर्यंत कधीच बाहेर येत नाही . त्यामुळे धुळीचे जड जड कण फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफुसांची क्षमता कायमची कमी करून टाकतात . अजून एक धक्कादायक माहिती मला कळाली ती म्हणजे अशी की या गावाचे सरासरी आयुर्मान ५० ते ६० होते . याचा अर्थ साठीच्या पुढे शक्यतो कोणी जगत नसे . हे फारच भयानक व विदारक सत्य होते .शिवलिंगाच्या सर्व महत्त्वाच्या फॅक्टरी रमेशने मला दाखवल्या . हे गाव इतके मोठे होते आणि इतक्या फॅक्टरी होत्या की त्या सर्व मी जाऊन पाहणे केवळ अशक्य होते . नर्मदा मातेने त्या क्षेत्रातला तज्ञ मला गाठून दिला त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले . इथे परिक्रमा वासीं कडून शक्यतो शिवलिंगाचे पैसे कोणी घेत नाही . आणि परिक्रमा वासी देखील इथून शिवलिंगे घेत नाहीत कारण ते सोबत बाळगायचे म्हणजे ओझे वाढविण्याचे काम असते . परंतु मला काही लोकांनी दिलेली शिवलिंगे मी आनंदाने स्वीकारली . अर्धनारी नटेश्वराचे एक सुंदर शिवलिंग मला मिळाले . 

अर्धनारी नटेश्वर असा असतो

आत्मज्योती किंवा आत्मलिंग असणारे शिवलिंग

असे बहुरंगी दगड नर्मदा मातेमध्ये सापडतात ते गोळा करून रमेश सारखी माणसे कारखान्यांमध्ये आणून देतात आणि तिथे शिवलिंगाला आकार दिला जातो .

रमेश जाधव याला सर्वच दुकानदार अतिशय मानत होते असे माझ्या लक्षात आले . एक तर तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आला होता तसेच त्याला शिवलिंगे बनविण्यातले खूप चांगले ज्ञान होते असे सर्वांनी मला सांगितले . काही दुकानदारांनी तर सांगितले की रमेश जाधव जे सांगेल तेच अंतिम सत्य या गावात मानले जाते इतके या क्षेत्रातले ज्ञान त्याला होते . त्याला मैया कुठल्या प्रकारचा दगड कुठे आहे ते सांगायची . प्रसंगी खोल पाण्यामध्ये डुबक्या मारून हा दगड काढायचा . इथे केवट आणि कहार लोक दगड गोळा करण्याचे काम करतात . अलीकडे हे लोक देखील शिवलिंगे बनवू लागले आहेत . परंतु या गावांमध्ये या व्यवसायाची सुरुवात ज्यांनी केली ते दीपक नामदेव म्हणून आहेत त्यांच्याकडे देखील मला रमेश जाधव घेऊन गेला . यांच्याकडे फारच अप्रतिम शिवलिंगे होती . त्याने गावातील किमान २० ते २५ प्रतिष्ठित व्यापारी लोकांशी माझी गाठ घालून दिली . रमेश जाधव हा ढिगाने शिवलिंगे न आणता जे हवे ते चित्र असलेले शिवलिंग घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध होता त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय मान होता . त्यात रमेश जाधव घेऊन आला आहे म्हटल्यावर प्रत्येक दुकानांमध्ये माझे अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत व्हायचे . तुमची संगत चांगली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर अशा पद्धतीने होतो . रमेश जाधव ने मला बघावा गावातील काही अशा ठिकाणी नेले जिथे शिवलिंग बनविण्याचे काम चालू असेल असे स्वप्नातही कोणाला वाटणार नाही . अतिशय भव्य दिव्य शिवलिंगे बनवणारी माणसे देखील इथे आहेत . प्रत्येक कारखान्याने आपली स्वतःची काही वैशिष्ट्ये जपलेली आहेत . संपूर्ण भारतभरातून शिवलिंगे खरेदी करण्याकरिता लोक इथे येतात . मला देखील आळंदी , देहू , पंढरपूर , मराठवाडा येथील अनेक मराठी माणसे भेटली जी शिवलिंगे खरेदी करण्याकरिता इथे आलेली होती . इथे शिवलिंगाची खरेदी तुम्हाला योग्य भावामध्ये करून देणारे शेकडो दलाल फिरत असतात .  हा सर्व परिसर अतिशय अद्भुत असाच आहे ! मी प्रत्येक दुकानांमध्ये गेल्यावर त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक शिवलिंगे तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगे दाखवायला सांगत असे . विशेषतः सौरमाला अंकिता असलेले शिवलिंग मला आवडले तसेच आत्मलिंग देखील खूप सुंदर दिसते . काही शिवलिंगामध्ये सोनेरी रंगाच्या छटा देखील आढळतात . आज-काल राजस्थान भागातील काही दगड नर्मदे काठील आहेत म्हणून खपविले जातात परंतु रमेश जाधव हा असा एकमेव तज्ञ होता जो पाहता क्षणी दगड नर्मदेतील आहे का बाहेरचा आहे हे डोळे मिटून सांगायचा . त्या दगडाला स्पर्श करून तो नर्मदेची स्पंदने येतात की नाही ते तपासायचा . कुठल्या दगडामध्ये किती स्पंदने आहेत हे देखील त्याला लगेच कळत होते . मला सापडलेली सर्वच शिवलिंगे त्याला खूप आवडली . आणि ही सर्व शिवलिंगे दुर्मिळ असून केवळ मैयाच्या कृपेनेच अशी सापडू शकतात हे देखील त्याने मला सांगितले . मला यातले काहीच ज्ञान नसल्यामुळे हो म्हणून मान हलवण्या शिवाय माझ्या पुढे कुठला पर्याय देखील नव्हता . 

बकावा गावातील शिवलिंगांची माहिती आदरपूर्वक प्रस्तुत लेखकाला देताना एक दुकानदार .यातील प्रत्येक शिवलिंग पाहिल्यावर तो दगड कुठला आहे हे रमेश जाधव मला सांगत होता इतका त्याचा अभ्यास होता . या गावातील प्रत्येक शिवलिंग त्याला पाठ होते .

हाताने हलविणे देखील अशक्य आहे अशी ही शिवलिंगे केवळ डोळ्याच्या मापाने कशी बनवत असतील विचार करून पहा ! हे दैवी कृपे शिवाय शक्य नाही . या गावातील लोकांना ही सिद्धी प्राप्त आहे . जयपुर लाल दगडापासून बनवलेल्या अन्य देवांच्या मूर्ती देखील इथे विक्रीला ठेवलेल्या होत्या .

दरम्यान माझे जुने बूट मला पुन्हा एकदा सापडले . मी ते सामानामध्ये कधी ठेवले मलाच आठवत नव्हते . अन्यथा या गावातून अनवाणी चालताना पायामध्ये दगड घुसून जखमा होण्याचे प्रमाण खूप जास्त होते . शिवलिंगाच्या मापामध्ये जलहरी बनवून देण्याचा देखील व्यवसाय इथे काही लोक करत . 

या शिवलिंगाची लांबी किती आहे पहा आणि याचे वजन किती असेल कल्पना करून पहा !

त्याच्याही पेक्षा मोठे शिवलिंग पाहताना प्रस्तुत लेखक . मागे अख्खी बैल जोडी आणि नांगर लपला आहे !  अशा शिवलिंगांची स्थापना करणारे लोक धान्य होत ! 

अशा पद्धतीने खूप सारी शिवलिंगे रमेश जाधव ने मला दाखवली . वाटीमध्ये आम्हाला दोन लहान मुले भेटली . त्यांच्या आग्रहा खातर त्याच्या घरी गेलो .  राम केवट असे या मुलाचे नाव होते . वय वर्ष ११ . दहा वर्षाचा एक भाऊ याला होता . याचे वडील दम्यामुळे निधन पावले होते . वयाच्या आठव्या वर्षापासून हा शिवलिंगे विकण्याचा व्यवसाय करू लागला होता . रमेश जाधव ने मला सांगितले की आपल्या मार्केटिंग कौशल्याच्या जोरावर हा आज बकावा गावातील सर्वात जास्त शिवलिंगे विकणारा मुलगा ठरलेला आहे ! याने आता स्वतःची निर्मिती बंद करून बकावा गावातील सर्वच शिवलिंगांचे मार्केटिंग सुरू केलेले आहे ! याने मोठ्या विश्वासाने त्याच्या घरी नेऊन मला त्याच्या आईची भेट घडवली . असा कुलोद्धारक पुत्र जन्माला घालणाऱ्या त्या मातेला मी नमस्कारच केला ! आपल्या घरातील नऊ दहा अकरा बारा वर्षाची मुले काय करतात ते जरा आठवून पहा . नर्मदे काठी राहणारी त्याच वयोगटातील ही दोन मुले आज लक्षावधी रुपयांची उलाढाल करत होती . त्यांच्या आईने मला सांगितले की या मुलांनी वडिलांपेक्षा कैक पटीने आपला व्यवसाय वाढविलेला आहे .  कारण यांचे वडील फक्त शिवलिंगे निर्माण करायचे . साधारण आठवड्याला एखादे चांगले शिवलिंग तयार व्हायचे . परंतु ही मुले मात्र दर दिवसाला कित्येक शिवलिंगे विकत असतात . त्यामुळे यांना व्यापाराची अधिक संधी मिळत असे . शिवाय लहान मुले पोट तिडकी ने माहिती सांगत आहेत हे पाहून लोक देखील डोळे झाकून खरेदी करत .  त्या मुलांनी मला देखील काही शिवलिंगे भेट दिली . यांच्या घरातून नर्मदा मातेचे आणि बघावा गावाचे खूप सुंदर दर्शन होत असे . मुलांनी घरातील फोनवर काही फोटो काढले ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 

राम शाम केवट बंधूं सोबत प्रस्तुत लेखक . अकाली पडलेल्या जबाबदारीमुळे ह्या मुलांचे बालपण थोडेसे हिरावले गेले असून ती पोक्त वाटत आहेत परंतु ती वयाने लहानच होती . मागे दिसणारे बकावा गाव .

गावातील सर्व घरे बैठी असताना यांनी मात्र स्वकमाईने आणि स्वकष्टाने घरावर माडी चढविली होती . त्यातून सुंदर असे नर्मदा मातेचे दर्शन होत असे . मागे आपल्याला जे बेट दिसते आहे त्याच्या समोरच बाजीराव पेशवा यांची समाधी आहे .

हे परम सुंदर दर्शन घेताना मन भरून आले ! गावावर पसरलेली धुळीची चादर दिसते आहे का पहा ! 

अकरा बारा वर्षाचा राम केवट . या मुलाला मनापासून दंडवत ! नर्मदेचे पाणीच निराळे आहे हेच खरे ! 

मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे अशा लोकांनी नर्मदा खंडातील मुलांचे मानसशास्त्र आणि त्याच्यावर नर्मदा परिक्रमेचा होणारा परिणाम या विषयावर अवश्य संशोधन करावे असे मी त्यांना सुचवेन . मला चहा पाजून पुन्हा बाहेर सोडायला ही मुले आली तेव्हा त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने त्यांच्या घरामध्ये ते कुठल्याही परिक्रमा वासीला कधी बोलवत नाहीत . कारण घरामध्ये त्यांची तरुण माताजी एकटी असते . परंतु यांना माणसाची पारख देखील चांगली होती . इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण पाहून मी खरोखरीच थक्क झालो ! भल्या भल्या लोकांना जे साध्य होत नाही ते शहाणपण त्यांना नर्मदा मातेने वडिलांच्या मृत्यू सोबत सहज बहाल करून टाकले होते . इथून पुढे रमेश जाधव मला अजून एका मित्राकडे घेऊन गेला . याच्याकडे छोट्या छोट्या आकाराची हजारो शिवलिंगे होती . हे घेऊ का ते घेऊ असे व्हावे इतकी सुंदर शिवलिंगे इथे सापडतात . परंतु वजनाची मर्यादा असल्यामुळे मोजकीच घेता येतात . याने मला अतिशय सुंदर असे शिवलिंग भेट दिले . त्याच्या बदल्यात मी त्याला बसल्या बसल्या त्याच्या संपूर्ण व्यवसायाची सुंदर अशी वेबसाईट बनवून दिली . त्याला अतिशय आनंद झाला आणि लगेच त्याने प्रचार प्रसार सुरू केला . या गावामध्ये एका तरुण साधूचा मृत्यू झाल्यामुळे त्याची समाधी गावकऱ्यांनी उभी केली होती . या समाधीवर जे शिवलिंग स्थापित करण्यात आले त्याच्यावर रात्री अचानक त्या साधूचा चेहरा उठला ! हा चमत्कार पाहण्यासाठी आठवडाभर बघावा गावामध्ये प्रचंड गर्दी झाली होती . या प्रकारापासून या गावातील शिवलिंगांचे महत्त्व फार वाढले असे मला रमेशने सांगितले . त्याने मला ते शिवलिंग नर्मदे काठी नेऊन दाखवले आणि खरोखरच माझ्या अंगावर काटा आला कारण त्या साधूचा सुस्पष्ट चेहरा त्या शिवलिंगावर फोटो छापल्याप्रमाणे उठलेला होता ! ज्याला इंग्रजीमध्ये सिलोव्हेट असे म्हणतात त्या प्रकारचे हे चित्र होते . शिवाजी महाराजांचा जाणता राजा असे लिहिलेला अर्धा चेहरा आठवून पहा त्याला सिलोवेट असे म्हणतात . 

रमेश जाधव ला मला भेटून फारच आनंद झाला होता हे तो दर दहा-बारा वाक्याने बोलून दाखवायचा ! त्याच्या घरी गेल्यावर त्याने बालभोग देऊन चहा पजला . गावात नर्मदा परिक्रमा वाशींची सेवा करणारी एक धर्मशाळा होती तिथे एका आपला राम केवट सेवा करायचा . त्याने मला मस्तपैकी भोजन वाढले ! एका वयोवृद्ध मातारामनी भोजन बनवले होते .

एखाद्या जुन्या हवेली सारखी असलेली सुंदर धर्मशाळा . येथे परिक्रमावस्यांची खूप आगत्याने सेवा केली जाते

त्याच्यासोबत असलेल्या सर्व परिक्रमावस्यांसोबत त्याच्या फोनवरून बोलणे झाले . माणिक पाटील यांची परिक्रमा दुर्दैवाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिली . बाकी जळगावचे परिक्रमावासी नामदेवराव भोळे असोदेकर आणि नगरचे गायक पं. पवन श्रीकांत नाईक या दोघांशी प्रेमाचे बोलणे झाले . मी रमेश जाधव यांना भेटल्याचा दोघांना आनंद झाला . दमगड च्या रामकुटी च्या प्रकरणात मी जो व्हिडिओ टाकला आहे (नर्मदा मातेच्या दर्शनाचा ) त्याच्यामध्ये या चौघांचे दर्शन आपल्याला होते पहा . 

बकावा गावातील शिवलिंगे कशी असतात याची थोडीशी झलक आपल्याला खाली देत आहे .

 

बकावा चा किनारा

 नर्मदाजीका हर कंकर शंकर होता है !

रमेश जाधव ने मला या व्यवसायातील आर्थिक गणित देखील समजावून सांगितले परंतु ते मुद्दाम येथे देत नाही कारण या लोकांचा जीव घेणा धंदा बसावा असे मला वाटत नाही . हा व्यवसाय केल्यास लवकरच आपला मृत्यू होणार हे निश्चित आहे हे माहिती असून देखील केवळ देवाची सेवा करायला मिळते आहे म्हणून लोक हा व्यवसाय करत आहे ही किती मोठी गोष्ट आहे विचार करून पहा . अशा या ज्ञात अज्ञात , जीवित , दिवंगत सर्वच बकावा वासियांना साष्टांग नमस्कार ! नर्मदे हर !

लेखांक बाहत्तर समाप्त (क्रमशः )

लेखांक ७३ : तेली भट्याण चे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा

कोsहम्

दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . काठाने चालताना खूप आनंद मिळत होता . इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता . परंतु इथे कोणी त्याला दगड म्हणत नाहीत . तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिले जाते . बरेच अंतर चालल्यावर मर्दाना नावाचे गाव आले . त्या गावामध्ये मी काठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला . मी कुठून आलो कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला . त्याने सांगितले की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे . 

हरिहर कुटी आश्रम मर्दाना

तो नर्मदेचा आदेश मानून मी त्याच्याबरोबर आश्रमामध्ये गेलो . आश्रम अतिशय सुंदर होता . भरपूर झाडी होती . अनेक मंदिरे होती . निवासाची उत्तम व्यवस्था होती .तिथे आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते . सर्वजण झोपायच्या तयारीत होते . इतक्या तिथे कुठून तरी दहा-बारा छोट्या मुली प्रकट झाल्या ! मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला ! प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हा ठेवून मला आशीर्वाद दिला ! नंतर त्या मुली माझ्याशी खेळू लागल्या ! आश्रमात एक जिना होता . या जिन्याच्या कुठल्या पायरीवरून खाली उडी मारता येते पाहूया असा खेळा आम्ही सुरू केला . आमच्या दंग्यामुळे अवधूत वैतागला आणि मला रागवून गेला ! मग मी मुलींना शांतपणे खेळायची सूचना केली . मुली देखील अतिशय 'सायलेंट मोड ' मध्ये खेळू लागल्या ! मला मी स्वतः चार-पाच वर्षाचा मुलगा झाला आहे असे वाटत होते ! हा खेळ थांबू नये असे वाटत असतानाच पुढे भटियाण तेली गाव गाठायचे आहे हे लक्षात आले . तिथे असलेल्या एका माणसाने मुलींसोबत माझा फोटो काढला . आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिला .

मर्दाना गावातील दशकन्यांसोबत प्रस्तुत लेखक

माझ्यासोबत आलेला मनुष्य मला म्हणाला की आता इथून पुढे काठाने रस्ता नाही तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो . परंतु मला काठाने जायचे आहे असा निर्धार मी त्याला सांगितल्यावर त्याने सांगितले की इथे अतिशय अवघड असा एक ओढा लागतो जो कोणालाही पार करता येणार नाही असा आहे . वनस्पती आणि शेवाळे माजल्यामुळे त्या ओढ्यात उतरून देखील तो पार करता येत नाही . आणि नाव देखील तिथे चालत नाही . 

हरिहर कुटी आश्रमाला लागून असलेला हाच तो कठीण ओढा . वरती नर्मदा मैय्या दिसते आहे .

त्याच्यासोबत मी चालू लागलो . अचानक त्याने परिक्रमेला लक्ष्मणदास साधूंना वगैरे शिव्या घालायला सुरुवात केली . मला कळेना की याला अचानक काय झाले . त्याने मला इस्लाम हाच धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि इस्लाम शिवाय जगाचा उद्धार कसा होऊ शकत नाही हे समजावून सांगायला सुरुवात केली . मी त्याला नाव विचारले असता त्याने सांगितले की त्याचे नाव सय्यद होते आणि तो इथला इमाम होता . मी त्याला विचारले की तुझ्या पूर्वीच्या सात पिढ्यांची नावे तुला माहिती आहेत का ? माझ्याकडे माझ्या पूर्वीच्या २१ पिढ्यांची नावे आहेत हे त्याला सांगितले . आणि सर्व २१ च्या २१ पिढ्या माझे आजचे कुलनाम आहे तेच लावत होते हे देखील सांगितले . याचा अर्थ आमचा वंश जो काही धर्म पाळत आला होता त्याचे पालन करूनही टिकत होता . परंतु त्याचे मात्र तसे नव्हते तीन-चार पिढ्यापूर्वी त्याच्या हिंदू पूर्वजांनी इस्लाम भीतीपोटी स्वीकारलेला होता . भारतातील बहुतेक मुसलमान हे भीतीपोटी हिंदू धर्म त्यागून मुसलमान झालेले लोक आहेत . त्यांच्या पूर्वजांनी कदाचित धैर्य दाखवले असते तर आज ते देखील हिंदू असते . तो काळ भीतीचा होता म्हणून धर्मांतरण केले इथपर्यंत ठीक आहे परंतु आता परधर्मियांची भीती नसल्यामुळे पुन्हा आपल्या मूळ पदाकडे यायला काय हरकत असावी ? असे उलटे मीच त्याला विचारले . चालता चालता आमची चर्चा तापू लागली . त्याने नर्मदा परिक्रमा परंपरेला उलट सुलट बोलायला सुरुवात केली . माझा पारा चढला . मी त्याला सांगितले की तू शेवटचा अपराध केलेला आहेस त्यामुळे मी एक दोन साडे माडे तीन असे म्हणेपर्यंत तुला जितक्या लांब पळता येईल तितके पळून जा . त्याच्यानंतर जे काही होईल त्याला मी जबाबदार असणार नाही . एकंदरीत माझा रुद्र अवतार पाहून सय्यद टिंब टिंब ला पाय लावून वेगाने पळून गेला . अशा पद्धतीने इस्लामची दावत नर्मदा परिक्रमामध्ये अनेकांना मिळाल्याचे मला नंतर कळाले . सुग्रास पंचपक्वान्नांचे भोजन चालू असताना मध्ये एखादे हाडूक त्यात येऊन पडावे असे मला झाले . परंतु तो दिसायला अगदी हिंदू वाटत होता . इमाम असून देखील त्याने दाढी वगैरे राखली नव्हती तर अगदी एखाद्या हिंदू सारखा राहायचा . असे आपले खरे स्वरूप लपवणारे लोकच इथून पुढे आपल्या राष्ट्रासाठी धोकादायक ठरणार आहेत . अशा व्यक्तीचे नाव गाव कुळ दिसणे शिक्षण यापैकी कुठल्याही गोष्टीवरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज लावता येणे केवळ अशक्य असते . मनामध्ये विष घेऊन त्या विषाची पेरणी सर्वत्र करणारे हे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत . सय्यद पळून गेल्यावर मी पुन्हा एकदा काठाकडे वळलो . इथे काठाकडे जाणारा रस्ताच नव्हता तर सर्वत्र झाडी दिसू लागली . मोठ्या कष्टाने काटेरी झाडीपार केल्यावर मला एक दोन पुरुष खोल ओढा लागला . नर्मदे काठचे सर्व ओढे तुम्हाला नर्मदे कडेच घेऊन जातात हे माहिती असल्यामुळे मी ओढ्यामधून चालायला सुरुवात केली . ओढा जवळपास कोरडा पडत आला होता . परंतु या ओढ्यामध्ये प्रचंड काटेरी झाडे होती . ती सर्व मी लीलया पार केली . जणूकाही ते काटे नसून गुलाबाच्या पाकळ्या आहेत असा त्यांचा स्पर्श मला होत होता . मी जेव्हा त्या ओढ्यातून बाहेर पडलो आणि समोर नर्मदेचे पात्र दिसले तेव्हा एक शेतकरी तिथे बसलेला होता . माझ्याकडे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला ! तो म्हणाला बाबाजी इथून कुठून आलात ? मी त्याला सांगितले की असा असा ओढ्याच्या मार्ग पकडून मी आलेलो आहे . तो म्हणाला परंतु तिथे तर इतके काटे आहेत . तुम्ही कसे काय बाहेर पडलात ? मी त्याला मला आलेला अनुभव सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून नर्मदा मातेचा जयजयकार केला ! वाचकांना कल्पना यावी म्हणून मी तो ओढा आणि ते शेत गुगलवर शोधून काढले आहे त्याचा नकाशा खाली टाकत आहे .

लाल मार्कर दिसतो आहे तिथे शेतकरी मला भेटला व तेच हिरवेगार शेत त्याच्या मालकीचे आहे . तिथवर झाडांचा जो हिरवागार पट्टा येतो आहे तोच ओढा होता .बाकी सर्वत्र वाळू काटेरी झुडपे यांचेच साम्राज्य आहे .

शेतकरी मला म्हणाला की गेल्या वर्षा दोन वर्षात या मार्गाने कोणीच गेलेले नाही . याचे कारण असे आहे की नर्मदा मैया येथे डावीकडे वळण घेते आणि रस्त्याने चालत गेल्यावर अंतर कमी पडते . तसेच नर्मदेच्या काठाने चालताना प्रचंड काटेरी झुडपे आणि घनदाट अरण्य आहे त्याच्यामध्ये वन्यपशूंचा वास देखील आहे . रानडुकरे, कोल्हे, लांडगे ,बिबटे , साळींदर यांचा वावर या भागामध्ये असतो . परंतु या सर्वांखेरीज अजून एका गोष्टीचा वास तिथे आहे .तो म्हणजे नर्मदेचा वास ! आणि त्या वासाचाच सहवास मला हवा होता त्यामुळे मला दुसरा कुठला मार्ग आवडणे किंवा सूचणे शक्यच नव्हते . काठावरचा मार्ग अतिशय सुंदर होता . पुढे असलेल्या लेपा धरणामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता आणि पाणी शांत होते . इथे फारशी वळणे नसून एका सरळ रेषेमध्ये नर्मदा मैया वाहताना दिसते . डाव्या हाताला संपूर्ण दाट झाडी असून तिथे तुम्ही एकदा आत शिरला तर बाहेर येऊ शकणार नाहीत इतकी ती घनदाट आहे . पायाखाली मऊशार गाळमाती आहे . हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून अगदी मासे पकडणारे लोक सुद्धा फार क्वचित दिसतात . आतापर्यंत मी जे काही अंतर चाललो होतो त्यातील अतिशय सुंदर असा हा पाय मार्ग होता . संपूर्ण सहा किलोमीटरचे अंतर तोडताना फक्त नर्मदा मैया आणि मी असे आम्ही दोघे जण होतो ! इथे पात्रात फारसे दगड देखील नसल्यामुळे बगळे , पाणपक्षी देखील कमी होते . पाणी चांगलेच खोल होते . हा परिसर कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून नकाशे जोडत आहे .

पथराड गावातील बेट सोडले की पुन्हा नर्मदेमध्ये एक सुद्धा दगड दिसत नाही . नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहते आहे . प्रचंड झाडी जरी असली तरी धरणातील पाण्याची पातळी वाढते आणि कमी होते त्यामुळे काठावरती साधारण चार-पाच फुटाचा वनस्पती विरहित मातीचा पट्टा तयार झालेला आहे .  त्याच्यावरून चालत राहिलो .

नर्मदेने डावीकडे घेतलेले वळण आपल्याला येथे दिसते आहे . उजवीकडून डावीकडे वाहणारी नर्मदा नदी आपण पाहतो आहोत . सर्वात उजवीकडे मर्दाना गाव असून किनारा पकडून मी श्री सियाराम बाबा आश्रम (तेली भट्याण ) काठाकाठाने गाठला .

धरणातील पाण्याच्या चढउतारामुळे प्रचंड चिखल सर्वत्र सुरू झाला होता . हा चिखल कधी कधी गुडघाभर देखील होता . परंतु याच्यामध्ये पाय पूर्णपणे बुडणार नाही याची काळजी घेणारा एक दुर्दैवी घटक तिथे सर्वत्र आढळत होता . या संपूर्ण हिरव्यागार चित्राला गालबोट लावण्याचे काम नर्मदेच्या दुतर्फा साठलेले प्लास्टिकचे थर करत होते ! मी तिथे काय काय वस्तू पडल्या आहेत याचा हिशोब लावला . शाम्पू च्या पुड्या , शाम्पू च्या बाटल्या, उदबत्तीच्या पुड्या , रबरी चपला ,बूट ,अंगातील कपडे , प्लास्टिकच्या पिशव्या , थर्माकोलच्या पत्रावळ्या , प्लास्टिकचे ग्लास आणि चमचे ,प्लास्टिकचे कागद , पीव्हीसी पाईपचे तुकडे , प्लास्टिकची खेळणी , नर्मदेला वाहिलेल्या टेरिकॉटच्या साड्या , वाहून आलेली नायलॉनची कोळ्यांची जाळी अशा वस्तूंचा अक्षरशः खच तिथे पडला होता . काही ठिकाणी हा थर साधारण चार फूट जाडीचा झाला होता . म्हणजे संपूर्ण पाय आत मध्ये घातला तरी प्लास्टिकच प्लास्टिक लागत होते . थोड्या अंतरावर असलेल्या लेपा धरणामुळे पाणी संथ होऊन हा सगळा कचरा इथे साठला होता . या सर्व प्लास्टिक सोबत आलेल्या रसायनांमुळे या भागातील पाणी अतिशय दूषित झालेले असणार हे उघड होते . या प्लास्टिकचा एकमेव फायदा असा होत होता की त्यामुळे चिखलामध्ये माझा पाय फसत नव्हता तर प्लास्टिक वर पाय ठेवून चालता येत होते . तसेच हा प्लास्टिकचा थर जेवढ्या भागत होता तिथे एक गवताची काडी सुद्धा उगवू शकत नव्हती .  मी मनोमन असा निश्चय केला की भविष्यात कधी काळी नर्मदे काठी प्लास्टिक निर्मूलनाची कुठली चळवळ उभी केली तर ती सर्वप्रथम या भागात राबवावी . इतके प्लास्टिक इथेच पडले होते .  बाकीचे काय करतात माहिती नाही परंतु आपण स्वतःपुरता जरी असा निर्णय घेतला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदा मातेमध्ये किंवा अन्य कुठल्याही जलस्त्रोतांमध्ये टाकणार नाही तरी हा प्रश्न खूप सहज गत्या सुटणारा आहे . प्लास्टिकच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी तज्ञ असतील तर त्यांनी कृपया या मध्ये लक्ष घालावे . प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया या नावाने ज्यांना ओळखले जाते ते पद्मश्री डॉक्टर आर वासुदेवन यांना व्यक्तिशः भेटून मी हा संपूर्ण विषय समजावून सांगितलेला आहे . त्यांनी रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे तंत्र शोधून काढलेले आहे परंतु त्यासाठी काही ठराविक प्रकारचे प्लास्टिक लागते .अशा प्रकारचे रबर अधिक प्लास्टिक अधिक पॉलिथिन  अधिक पोलियुरेथिन अधिक पॉलिस्टर त्यांना चालत नाही . हे सर्व प्लास्टिक आहे असे उचलून याला उष्णता युक्त दबाव देऊन त्याचे चौकोनी ब्लॉक तयार केले ,तर त्याचा वापर धरण किंवा बंधारे बांधताना करता येऊ शकतो . कालांतराने याचे रूपांतर एका अभेद्य खडकामध्ये होऊ शकते . कृपया तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा . असो . माझे लक्ष सतत डावीकडच्या झाडीकडे होते . एखादे वन्य श्वापद अचानक अंगावर येऊ नये इतकी माफक अपेक्षा होती . हळूहळू पायाखाली असलेल्या चिखलाचे प्रमाण वाढू लागले . आणि आता तर अखंड गुडघाभर चिखलातून मी चालत होतो . मला पुन्हा एकदा इंद्रावती नदीतील चिखल आठवायला लागला . ज्या अर्थी या मार्गाने कोणी जात नाही त्याअर्थी इथे देखील असेच काहीतरी होऊ शकते याची मनाची तयारी मी करून ठेवली होती . अचानक समोर एक ओढा आडवा आला . प्रचंड जंगलातून हा बाहेर आला होता . त्यामुळे त्याला काठ वगैरे प्रकार नव्हता . आता हा ओढा ओलांडणे क्रमप्राप्त होते . हा ओढा किती भयानक आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या ओढ्याचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . 

सियाराम बाबांचा आश्रम जवळ आलेला असताना मला आडवा आलेला ओढा लाल मार्कर ने दाखवलेला आहे . 

हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला गुडघाभर चिखल कसा होता आणि ओढा कसा होता हे लक्षात यावे ! लाल मार्कर दाखविला आहे त्याच ठिकाणावरून मी ओढा पार केला .

मी ओढा पार करण्याकरता थांबलेलो आहे हे बघताक्षणी दूरवर नावेतून मासे पकडणारा एक केवट ओरडला चलते रहो चलते रहो ! त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही परंतु हात वारे लक्षात आले . मी नर्मदा मातेचे स्मरण करून ओढ्या मध्ये पाऊल ठेवले . इंद्रावती नदी बरी म्हणायची कारण तिथे पाय स्थिर तरी राहत होता . इथे प्रत्येक पाऊल चिखलात जात होते ! गुडघाभर पाण्यात गेल्यावर मी पुन्हा नावाड्याकडे पाहिले . अजूनही तो मला पुढे जा पुढे जा अशी खूण करत होता . मी कमरे एवढ्या पाण्यात गेलो . पुन्हा नावाड्याकडे पाहिले . त्याचे पुढे जा पुढे जा सुरूच होते . बकावा गावामध्ये रमेश जाधव ने मला सांगितले होते की सियाराम बाबा ,हे त्यांना कितीही पैसे , कोणीही अर्पण केले , तरी त्यातले फक्त दहा रुपये काढून घेतात . उदाहरणार्थ कोणी त्यांना दोन हजार रुपयाची नोट दिली तर ते १९९० रुपये परत करतात .वीस रुपये दिले तर दहा रुपये परत करतात . म्हणून मी मला दक्षिणा मिळालेली एक दहा रुपयाची नोट माझ्या छाटीच्या पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवून दिली होती . पाठीवरचे दप्तर काढून मी डोक्यावर घेतले आणि साधारण छाती एवढ्या पाण्यात उतरलो . नशिबाने नर्मदेचे पाणी स्थिर असल्यामुळे ओढ्याच्या पाण्याला ओढ नव्हती . परंतु त्यामुळेच इथे खूप सारा गाळ देखील माजला होता . अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी ओढा पार झालो . ज्या नावाने मला हात केला होता त्याचे आभार व्यक्त करावेत म्हणून मी वळून मागे पाहिले . परंतु नावाडी काही दिसेना . कदाचित तो अतिशय वेगाने उलट दिशेला गेला असावा . परंतु इथे उभे राहिल्यावर मला साधारण तीन चार किलोमीटरचा नदीचा परिसर दिसत होता . नावाडी कुठेच दिसत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी नर्मदा मातेचा जयजयकार केला . त्याने अतिशय आश्वासक पद्धतीने पुढे जा असा जो एक इशारा केला होता त्याच्या बळावर मी इथपर्यंत आलो होतो . आयुष्यामध्ये गुरूचा सहभाग इतकाच असतो . एखादी गोष्ट करावी की न करावी याचा फक्त हो किंवा नाही इतका सल्ला गुरुने दिला तरी पुरेसा असतो . त्याने या मार्गाने आधी प्रवास केलेला असल्यामुळे त्याचा सल्ला हा विशेष महत्त्वाचा ठरत असतो . आता पुन्हा एकदा छोटे-मोठे नाले नर्मदार्पण होताना दिसू लागले .यातील पाणी घाणेरडे होते याचा अर्थ गाव जवळ आले होते . थोड्याच वेळात एक शेवटचा आंबील ओढा लागला . साधारण गुडघाभर खोलीचा थोडा मी धावतच पार केला आणि भटियाण तेली गावाचा घाट लागला . मुख्य भटियाण बुजुर्ग गाव इथून लांब आहे . त्याची एक छोटी वस्ती म्हणजे तेली भटियाण. या घाटावर वर्षभर प्रचंड गर्दी असते . रविवारी तर इथे पाऊल ठेवायला जागा नसते असे लोकांनी मला सांगितले . 

सियाराम बाबांचा घाट

या घाटावर बरेचदा अशी गर्दी असते

हे सर्व लोक फक्त आणि फक्त सियाराम बाबा यांच्या दर्शनासाठी येत असतात . इथे समोरच्या तटावर

गोगवाँ नावाचे गाव आहे . या गावातील नावाडी उत्तर तटावरून दक्षिण तटावर लोकांना आणून सोडतात . माणशी दहा रुपये किंवा वीस रुपये घेतले जातात . उत्सवाच्या काळामध्ये यातला प्रत्येक नावाडी किमान एक लाख रुपये कमवतो याच्यावरून आपण किती लोक येत असतील याचा अंदाज बांधावा ! दक्षिण तटावर जे लोक सडक मार्गाने दर्शनासाठी येतात त्यांना पाच किलोमीटर दूर गाडी लावून चालत यावे लागते . कारण पाच किलोमीटर लांबीची गाड्यांची रांग कधी कधी इथे लागलेली असते . सियाराम बाबांचे प्रस्थ हे असे आहे ! परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण त्यांना पाहिले तर इतका विरक्त मनुष्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नसेल ! केवळ एक लंगोटी हेच त्यांचे बारा महिने ठरलेले वस्त्र आहे . नर्मदा खंडातील सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या या महान तेजस्वी तपस्वी संतांच्या दर्शनाची ओढ मला लागली होती त्यामुळे मैयामध्ये प्रतिकात्मक स्नान करून थेट आश्रम गाठला . आश्रमामध्ये बाबा बसलेले होते ! सियाराम बाबांचे वय किती आहे यावरून अनेक मतप्रवाह आहेत . मी थेट बाबांना त्यांचे वय विचारले असता त्यांनी ८९ असे वय सांगितले . या घटनेला आता दोन वर्षे झाल्यामुळे त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षे आहे ( आंग्ल वर्ष 2024 रोजी ) . १०० , ११० ,१२० ,१३० वगैरे वयाचे आकडे अतिरंजीत आहेत . बाबांच्या रूपाचे वर्णन काय करावे ! अतिशय तेजस्वी अशी छोटीशी मूर्ती . शरीरामध्ये अत्यंत किमान आवश्यक इतकाच अस्थि मज्जा मांस याचा भाग शिल्लक राहिलेला . मेद तर नावाला सुद्धा नाही . परंतु या सर्वांवर मात करणारे प्रचंड तेज संपूर्ण अंगावरती विलसणारे ! पाठीमध्ये अलीकडच्या काळात आलेला बाक . गोरापान वर्ण ! अंगाला भस्म लावलेले . निळसर घारे डोळे ! डोक्यावर अर्धे टक्कल आणि अर्धा जटाभार ! वितभर दाढी . एका पायाला उंदीर चावल्यामुळे झालेली जखम . त्यावर पट्टी बांधलेली . यांच्या तीन मजली आश्रमामध्ये कुत्री मांजरे उंदीर साप बेडूक सर्वांना मुक्त प्रवेश आहे . कोणीही त्यांना हाकलत नाही .  

रामायण वाचत बसलेले सियाराम बाबा .समोर कोण आले गेले याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते .किमान ते तसे दाखवत तरी नाहीत .

बाबा एका सिंहासनावर कायम बसलेले असतात . इथेच रात्री झोपतात . समोर रामायणाची मोठी पोथी उघडून ठेवलेली असते व तिचे अखंड वाचन चालू असते . समोर एक जुना टीव्ही लावला असून त्याच्यावरती आलटून पालटून रामायण आणि महाभारत लावले जाते . हे रामायण महाभारत चालू असताना आवाज प्रचंड मोठा ठेवला जातो त्यामुळे बाबांना ऐकायला कमी येते की काय असे तुम्हाला वाटू शकते ! परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांनी बाबांशी फार काही बोलू नये म्हणून बाबांनी च केलेली ही युक्ती आहे , हे मला त्यांच्या शिष्यांनीच सांगितले !

कोणीही येऊन दर्शन घेऊ दे , बाबांचे वाचन थांबत नाही

 लोक रांगेत उभे राहून बाबांचे दुरून दर्शन घेत होते . हातात दिलेले दहा रुपये बाबा एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे समोर कोण येते आहे वगैरे गोष्टींकडे अजिबात लक्ष नव्हते . गावातीलच काही ग्रामस्थ इथे सेवेसाठी दिवस-रात्र येत राहतात . त्यांच्याशी मात्र बाबा मोठ्या आवाजात बोलताना दिसतात . बाबांना एक चष्मा पण आहे परंतु ते त्याचा वापर क्वचित प्रसंगी करतात . रांगेनुसार माझा देखील क्रमांक आला आणि मी तसाच पोटाच्या कप्प्यात हात घालून दहा रुपयाची ती ओली नोट काढली आणि बाबांच्या हातात ठेवली . बाबा नोट हातात घेऊन न बघता पलीकडे फेकत होते . परंतु माझी नोट त्यांना ओली लागल्यावर त्यांनी खालपासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिले .  "अच्छा परिक्रमावासी है " बाबा म्हणाले . त्यांचा आवाज ऐकून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले ! मला म्हणाले "गीले कैसे हो गये ? " मी बाबांना म्हणालो , "बाबा मै मैय्या के किनारे किनारे चल के आया । रास्ते मे एक नाला पडा । उसमे भीग गया । " बाबांनी खात्री पटवून घेण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या ग्रामस्थांकडे पाहिले . ग्रामस्थ म्हणाले होय बाबा बरोबर आहे . काठाने येताना ओढे ओलांडत यावे लागते . मी ग्रामस्थांना म्हणालो , " त्यांनाही हे माहिती असणार आहे ! " सगळ्यांनी आनंदाने बाबांचा जयजयकार केला ! सियाराम बाबा अजूनही मी दिलेल्या दहा रुपयाच्या त्या नोटेकडे उलटी पालटी करून पहात होते आणि त्यांच्या आजूबाजूला काहीतरी ते शोधत आहेत असे मला जाणवले . अखेर त्यांनी एका कोपऱ्यात ठेवलेला हिटर काढला . त्याच प्लग स्वतः सॉकेटमध्ये घातला . आणि तो चालू करून पुढून मागून ती दहा रुपयाची नोट वाळवत बसले . जसजसे त्या नोटेवरील पाणी उडून जात होते तसतसे माझ्या शरीराला चिकटलेले अनावश्यक विचार ,विकार नष्ट होत आहेत असा भास मला झाला . ती नोट जसजशी कडक होऊ लागली तसतसा मी देखील वैराग्याने कर्तव्य कठोर बनतो आहे असे मला वाटू लागले . एक क्षण असा आला की ती नोट संपूर्णपणे कोरडी दिसू लागली . जणू काही तिला कधी पाण्याचा स्पर्शच झाला नव्हता ! बाबांनी ती नोट फडकवली आणि हसू लागले ! इकडे मला देखील असे वाटू लागले की मला मायारूपी संसाराचा स्पर्श मुळात कधी झालेला नाहीच आहे !मी जन्मतःच परब्रम्ह स्वरूप आहे ! अहं ब्रह्मास्मि । सर्वम् खल्विदं ब्रह्म । चिदानंद रूपः शिवोsहम् शिवोsहम् । " अब सुखा हो गया ! अब हमारे पास रख सकते है । " बाबा टाळी वाजवत आनंदाने म्हणाले . हा संपूर्ण प्रकार होईपर्यंत मी बाबांच्या समोर हात जोडून उभा होतो . बाबांनी मला हाताने प्रसाद दिला . मी बाजूला झालो आणि ग्रामस्थ माझ्याशी बोलू लागले . ते म्हणाले बाबाजी तुम्ही खूप भाग्यवान आहात ! तुमची नोट सियाराम बाबांनी इतका वेळ हाताळली ! ते जेव्हा नोट उलटी पालटी करून पाहत होते तेव्हा तुमच्या आयुष्याकडे पाहत होते , भूत वर्तमान भविष्याकडे पाहत होते , हे लक्षात ठेवा ! त्यांनी तुमची आतापर्यंतची सर्व पापे जाळून टाकली ! तुम्हाला पुन्हा एकदा कोरडे केलेले आहे ! तुमची परिक्रमा सफल झाली !  हे ऐकून मला खूप बरे वाटले ! मी अजूनही ओला आहे हे पाहिल्यावर एका युवकाने मला मागे असलेल्या धर्म शाळेमध्ये नेऊन आसन लावण्यासाठी जागा दाखविली . इथे आधीपासून २५ ते ३० परिक्रमावासी येऊन उतरलेले होते . मी ओले कपडे पिळून वाळत टाकले .  आणि पुन्हा एकदा बाबांच्या समोर जाऊन बसलो . बाबांची ऊर्जा इतकी सकारात्मक होती की तिथून हलावे असे वाटतच नव्हते . सियाराम बाबा हे पूर्वाश्रमीचे उच्च विद्या विभूषित असून त्यांनी बारा वर्षे एका पायावर उभे राहून तप केलेले आहे आणि बारा वर्षे मौन साधना केलेली आहे . त्यामुळे पूर्वी त्यांना खडेश्वर बाबा आणि मौनी बाबा देखील म्हणायचे . बाबांच्या अनेक रंजक कथा भक्तमंडळी मला सांगत होती . एकदा सर्व भक्तांनी मिळून असे ठरवले की सियाराम बाबांना मारुती कार घ्यायची .त्यासाठी निळ्या रंगाची मारुती अल्टो गाडी सर्व भक्तांनी विकत घेतली आणि बाबांना भेट द्यायची ठरवली .बाबा थेट मारुतीच्या शोरूम मध्ये गेले . भक्तांना म्हणाले मी गाडी वापरावी असे तुम्हाला वाटते ना ?  घ्या ! सियाराम बाबा स्वतः गाडीमध्ये बसले आणि ती गाडी स्वतः चालवत भटियाण तेली घाटापर्यंत घेऊन आले आणि एका गॅरेजमध्ये जी लावून टाकली ती कायमचीच !पुन्हा कधीच बाहेर काढली नाही ! त्यावेळी बाबा गाडी चालवताना चा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे !

भक्तांनी दिलेली मारुती अल्टो गाडी चालवताना सियाराम बाबा.

बाबांच्या पायाला भक्तांनी स्पर्श करू नये म्हणून असा एक छोटासा पिंजरा तयार करण्यात आलेला आहे . रोज लाखो भक्तांनी पायावर डोके ठेवले तर त्यांच्या पायाची जखम कधीच बरी होणार नाही .

 रोज परिसरातील एक डॉक्टर येऊन त्यांच्या पायाला मलमपट्टी करतात .

परंतु सियाराम बाबा हे पुरते विदेही सत्पुरुष असल्यामुळे ते पायाची काळजी अजिबात न घेता कुठेही अनवाणी पायाने फिरतात .वरील चित्रामध्ये महापुराच्या पाण्यात अनवाणी पायाने चालताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत .

इथे थोड्याच वेळामध्ये वापीचा अवधूत फरले आणि त्याच्यासोबत चे सर्व परिक्रमा वासी देखील दाखल झाले . इथे नाशिक मध्ये निफाड तालुक्यात रुई देवगाव येथील ज्ञानेश्वर माऊली शिंदे हे कीर्तनकार देखील परिक्रमा संपवून ओंकारेश्वर पासून पायी आले होते . त्यांच्यासोबत एक माताराम होत्या . हे दोघे पुन्हा चालत नाशिकला निघाले होते . यांनी मला सियाराम बाबांविषयी भरपूर माहिती सांगितली . बाबांनी आता जिथे आश्रम आहे तिथे साधना केलेली आहे . एकदा नर्मदा मातेला महापूर आला . परंतु बाबांनी त्यांचे स्थान सोडले नाही . बाबांच्या पायाला स्पर्श करून मैया पुन्हा खाली निघून गेली . त्या पातळीच्या वर पुन्हा कधीच पाणी आले नाही . खाली बाबांनी एक मारुतीचे मंदिर बांधलेले आहे . एकदा यांचे आणि मारुतीचे काहीतरी भांडण झाले . त्यांनी चिडून मारुतीला त्या मंदिरामध्ये चिणून टाकला आहे ! रोज रात्री बाराच्या सुमाराला बाबा या मारुतीची नर्मदा मातेची तुळशीची पूजा करून मगच झोपतात असे मला माऊलींनी सांगितले . मला हे सर्व नवल वाटत होते ! आपल्याला हा सर्व प्रसंग स्वतः डोळ्यांनी पाहायला मिळावा अशी एक सूप्त इच्छा मनामध्ये येऊन गेली .  बाबांना लोक कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या आणून देत होते ! आता हा विदेही महापुरुष थोडीच शीतपेय पिणार आहे ! परंतु बाबा ती बाटली घ्यायचे आणि एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे शिष्य मग त्या सगळ्या बाटल्या गोळा करून एका बादलीमध्ये सर्व शीतपेये एकत्र करायचे . मग त्यात माझाचा आंब्याचा रस पण आला आणि सोड्यावाले थम्स अप पण आले ! आणि स्थानिक बाजारात मिळणारा जीरा सोडा सुद्धा आला ! हे सगळे एकत्र कालवले की बादली बाहेर ठेवायचे आणि परिसरातील कुत्री त्याच्यावर ताव मारायची ! सतत अति शर्करायुक्त पेयं पिल्यामुळे इथल्या सर्वच कुत्र्यांच्या अंगावर भरपूर त्वचारोग दिसत होते . परंतु तरीदेखील कुत्र्यांना आत मध्ये आल्यावर कोणी बाहेर काढत नव्हते . आपल्याला कोणी काही बोलत नाही ही माहिती असल्यामुळे इथल्या श्वानवर्गाच्या अंगात एक वेगळीच मस्ती संचारलेली दिसत होती ! 

परमपूज्य सियाराम बाबा यांचा छोटासा तीन मजली आश्रम . 

रामायण वाचत बसलेले  . शेजारी बाबांच्या डाव्या हाताला त्यांनी नोट वाळवली तो हिटर दिसतो आहे .

नर्मदा स्नान केल्यावर वर बघितले असता घाट असा दिसतो . भव्य पिंपळाचा वृक्ष संपूर्ण परिसरावर छाया धरून आहे . 

या झाडाखालीच बाबांनी स्थापन केलेला मारुती आहे

आश्रमातील शिवलिंग

मारुतीरायाला प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा

नर्मदा मातेला कितीही मोठा महापूर आला तरी देखील बाबांची नित्य पूजा थांबत नाही

प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा

मागे असलेल्या कठड्यापाशी राहून बाबा नर्मदा मैया ची देखील पूजा करतात .

नंतर जवळच टांगलेल्या तुळशीच्या कुंडीकडे जातात .

आणि तुळशीची देखील पूजा करतात . 

हे सर्व करताना बाबा सोबत काडीपेटी न ठेवता केवळ आपल्या हाताने ज्योत  प्रज्वलित करतात हे अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिलेले आहे . याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्हाला युट्युब वर सापडतील . इतके सियाराम बाबांचे तप:सामर्थ्य आहे असे म्हणतात !

बाबांच्या तपोबलाचे तेज त्यांच्याजवळ गेल्यावर कोणालाही जाणवते . त्यांची वाणी अतिशय धारदार आहे . त्यांची नजर तीक्ष्ण आहे . त्यांची स्मृती तल्लख आहे .  मी त्यांच्यासमोर खाली बसून राहिलो . हजारो लोक दर्शन घेऊन जात होते . बाबा फारसे कोणाकडे पाहत नव्हते . अचानक एखाद्या माणसाशी मात्र बोलायचे . एका नवाड्याने नवीन नाव घेतली होती . त्यांना दर्शन घेतल्याबरोबर बाबांनी विचारले काय घेतली का रे नाव ! केवट ढसा ढसा रडू लागला . तुमचे पाय नावेला लागावेत इतकीच इच्छा आहे असे म्हणाला . "बघुया ! जशी मैयाची इच्छा ! "  महाराज म्हणाले .

बाबांचे अखंड रामायण वाचन चालू होते . हळूहळू अंधार पडला आणि गर्दी कमी होऊ लागली . आता सर्व स्थानिक ग्रामस्थ तिथे येऊन बसले . बाबा हळूहळू रंगात आले आणि सगळ्यांशी गप्पा मारू लागले ! प्रत्येकाला ते नावाने ओळखत होते . इतक्यात एक गावकरी त्यांचे पाय दाबायला बसला . माझ्या मनात विचार आला की आपल्याला सुद्धा बाबांचे पाय दाबायला मिळाले तर किती बरे होईल ! इकडे रामायण जोरात सुरू होते ! त्याच्या आवाजात कोण कोणाला काय बोलतो याचा काही पायपोस कोणाला लागत नव्हता ! मी हळूच त्या पाय दाबणाऱ्या माणसाला खूण केली की मी सुद्धा पाय दाबू का ? तो मला म्हणाला की बाबा परिक्रमावासींकडून जरा सुद्धा सेवा घेत नाहीत . त्यांचा जन्म परिक्रमावासींच्या सेवेसाठी आहे असे ते सांगतात . त्यामुळे तुम्हाला ते पायाला हात तर लावू देणार नाहीतच पण मला सुद्धा पाय दाबू देणार नाहीत . मला असे फार जाणवले की हे जर तर चे याचे स्वतःचे अनुमान आहे . अजून थोडा वेळ गेला आणि माझ्या मनात तीव्र इच्छा होऊ लागली . पाय दाबण्याची पहिली पायरी म्हणून मी सर्वप्रथम पायाजवळ येऊन बसलो . बाबांचा एक पाय हा मनुष्य दाबत होता . एक पाय हलवत बाबा बसले होते . आपल्याकडे या गेम मधले ट्रम्प कार्ड होते ! हुकुमी एक्का! तो काढायचा मी ठरवले . मी हात जोडले आणि नर्मदा मातेची प्रार्थना केली , " मैया मला सियाराम बाबांचे पाय दाबायची इच्छा आहे . " मी डोळे उघडून बाबांकडे बघत बसलो . कोणीतरी अचानक काहीतरी सांगितल्यासारखे बाबांनी इकडे तिकडे पाहिले आणि माझ्याकडे डोळ्यात डोळे रोखून पाहू लागले . मला काही कळायच्या आत त्यांनी त्यांचा दुसरा पाय माझ्या दिशेला केला आणि म्हणाले , " दबाव " .माझ्या आनंदाला पारावार उरला नाही !  मला बाबा स्वतः पाय दाब म्हणाले आहेत हे शेजारच्या ग्रामस्थांच्या लक्षात आले ! ते खाणा खुणा करून एकमेकांना सांगू लागले ! त्यांच्यासाठी हा चमत्कार होता . कारण सियाराम बाबा कधीच कुठल्या परिक्रमावासीकडून कणभर सुद्धा सेवा करून घेत नाहीत .  माझे पाय दाबणे बहुदा बाबांना आवडले असावे . त्यांनी थोड्यावेळाने त्यांचा दुसरा पाय देखील माझ्या मांडीवर ठेवला ! हा त्या ग्रामस्थाला इशारा होता की आता तू पाय दाबू नको . तो मागे सरकला आणि मी बाबांच्या समोर येऊन बसलो . आता बाबांचे दोन्ही पाय माझ्या दोन्ही मांड्यांवर टेकलेले होते . आणि मी दोन्ही पाय एकाच वेळी दाबत होतो .बाबांचा एक पाय दगडासारखा कडक होता आणि एक पाय लोण्यासारखा मऊ होता .त्यांनी ज्या पायावर उभे राहून खडेश्वर तपस्या केली तो पाय दगडासारखा कडक झाला होता . दुसरा पाय अतिशय मऊ मृदू मुलायम होता .वरती बाबांचा टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू होता . मध्येच ग्रामस्थांशी बोलत होते . मध्येच रामायण वाचत होते . असा सुमारे तीन तास मला त्यांचा सत्संग लाभला ! त्यानंतर परिक्रमावासींची भोजनाची वेळ झाल्यामुळे मला आत बोलावण्यात आले . भोजन झाल्यावर पुन्हा काही काळ बाबांजवळ बसलो . त्यांची प्रत्येक कृती बघताना अतिशय आनंद वाटत होता ! शुद्ध परमात्म स्वरूप असा त्यांचा देह होता . त्यांची त्वचा इतकी नितळ आणि इतकी पातळ होती की विचारू नका ! अंगातील शीर आणि शीर दिसायची . रात्री बाबा बाहेर येऊन मारुतीशी कसे बोलतात ते मला ऐकायचे होते . त्यासाठी मी आश्रमामध्ये आसन न लावता बाबा जिथून बाहेर पडतात त्या दरवाजाच्या समोरच आसन लावले . माझ्यासोबत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आसन लावले . बाबांच्या खोलीमध्ये प्रचंड उंदीर होते . उंदीर त्यांचे पाय कुरतडून टाकायचे . म्हणून भक्तांनी बाबांसाठी एक पिंजरा केला होता . बाबा दिवसभर ज्या आसनावर बसतात रात्री त्याचे रूपांतर पिंजऱ्यामध्ये केले जायचे . जेणेकरून उंदीर आत येऊन चावू नयेत . माऊली आणि मी बाहेर झोपलेलो होतोच . प्रचंड थंडी पडली होती . आणि अशातच बाबांच्या कुटीचे दार उघडले . माऊलींनी मला सूचना केली होती की त्यांच्या पाया वगैरे पडायचे नाही .  झोपून राहायचे . परंतु आपोआप आम्ही दोघे उठून बसलो . बाबा हातामध्ये तीन पेटवलेल्या उदबत्या घेऊन शांतपणे बाहेर आले . हळूहळू चालत पायऱ्या उतरत मारुती मंदिरापाशी गेले . मारुतीला त्यांनी उदबत्ती ओवाळली . आणि दिवसभर काम करून संध्याकाळी भेटणारे मित्र कसे गप्पा मारतात तसे भिंतीवर ते एक हात ठेवून मारुतीशी गप्पा मारू लागले . त्यांचा संवाद असा होता की जणूकाही मध्ये मारुती देखील त्यांच्याशी बोलत होता . अशा चार-पाच मिनिटे गप्पा मारून झाल्यावर ते पिंपळाला प्रदक्षिणा घालत मागच्या बाजूला गेले . तिथे असलेल्या कठड्यावर हात ठेवून त्यांनी नर्मदा मातेला ओवाळले . तिच्याशी देखील दोन पाच मिनिटे त्यांनी संवाद साधला . त्यानंतर टांगलेल्या तुळशीच्या कुंडी पाशी गेले आणि तुळशीला ओवाळले . त्यानंतर हळूहळू आपल्या खोलीमध्ये गेले आणि पिंजऱ्यामध्ये शिरले . भक्तांनी पिंजरा आणि दार लावून घेतले . यानंतर मात्र ते रात्रभर खोलीमध्ये एकटेच असतात . त्यांच्याजवळ सेवेकरी म्हणून देखील कोणाला झोपायची परवानगी नाही . त्यांच्या काही भक्तांनी सांगितले की बाबा स्वतः हनुमंताचा अवतार असल्यामुळे रात्री हनुमंताच्या स्वरूपामध्ये झोपतात . तसे दर्शन देखील काही लोकांना झालेले आहे . परंतु प्रचंड थंडीमध्ये देखील बाबा कायम एकाच लंगोटीवर कसे काय राहू शकतात हे खरोखरच एक आश्चर्य आहे . त्यासाठी प्रचंड मनोनिग्रह पाहिजे . आणि देह बुद्धीचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय हे शक्य नाही . माऊलींमुळे मला सियाराम बाबांच्या या अप्रतिम रूपाचे अप्रतिम असे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचे आभार मानले . अवधूत ने बाबांच्या सोबत मी बसलेलो असताना बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले होते . परंतु परिक्रमा संपण्याच्यापूर्वीच त्याचा तो फोन पूर्णपणे फॉरमॅट झाला , असे नुकतेच त्याच्याशी बोलल्यावर कळाले . अन्यथा त्याच्या फोनवर त्याने काही अतिशय मौलिक क्षणांचे फोटो काढलेले होते . काही व्हिडिओ मात्र तो तिथूनच त्याच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करत होता ते अजूनही उपलब्ध आहेत . सकाळी उठल्यावर सियाराम बाबा वरती स्नानासाठी जातात . त्यांच्या आश्रमाचे तीन मजले आहेत . अतिशय अरुंद अशा जिन्याने वर जावे लागते . सर्वप्रथम ते सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन पक्षांना वगैरे खायला घालतात . मला तिथल्या सर्व ग्रामस्थांनी हे आधीच सांगून ठेवलेले असल्यामुळे मी आधीच वरती जाऊन बसलो होतो . ठरल्याप्रमाणे बाबा आले त्यांनी पक्षांना धान्य आणि माकडांसाठी बिस्किट वगैरे काढून ठेवली . तिथून खालच्या मजल्यावर आल्यावर अतिशय थंडगार अशा पाण्याचा एक हौद त्यांनी तयार केलेला आहे . त्यातल्या पाण्याने ते आंघोळ करतात . हे पाणी साचून राहिल्यामुळे अजूनच गार झालेले असते . बाबा चुकूनही गरम पाणी स्नानासाठी वापरत नाहीत . गावकऱ्यांनी खूप प्रयत्न करून पाहिले परंतु बाबा त्यांच्या कठोर तपाचरणामध्ये कुठलाही बदल करत नाहीत . यावर गावकऱ्यांनी जो उपाय शोधून काढला आहे तो ऐकल्यावर तुम्हाला लोकांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे ते लक्षात येईल ! बाबा पहिल्या मजल्यावर उघड्यावरती थंडगार पाण्याने अंघोळ करतात . त्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून काही तरुण गुपचूप एक प्रकार करतात . जसे बाबा वरती आंघोळीला गेले तसे खाली काही तरुणांनी लोखंडाच्या बादल्यांमध्ये भरपूर लाकडे पेटवून इमारतीच्या चारी बाजूने ठेवून दिली . त्याच्यामुळे त्या इमारतीच्या भोवतीची संपूर्ण हवा गरम झाली ! जरी बाबा गरम पाणी वापरत नसले तरी किमान गार हवा त्यांना बाधू नये इतकाच त्यामागचा हेतू ! गुरूभक्तीचे इतके अप्रतिम उदाहरण मी अन्यत्र कोठे पाहिले नाही ! बाबांचे स्नान झाल्यावर बाबांनी एका विशिष्ट पद्धतीने लंगोटी नेसली जी पद्धत मला कायमची स्मरणात राहिली . मी वेगळ्या पद्धतीने लंगोट नेसायचो . बाबांची पद्धत अधिक योग्य होती आणि त्यामध्ये त्यांनी मोकळ्या सोडलेल्या एका पदरा मुळे अधिक चांगल्या पद्धतीने लज्जा रक्षण होत असे . बाबांना भक्त किती मानतात हे इथे मला पाहायला मिळाले . बाबा जसजसे पुढे चालत निघाले तसेच अशी त्यांची ओली पावली मागे उठू लागली . काही तरुण भक्त त्या पावलांचे तीर्थ घेऊन चाटू लागले ! असे बाबा खाली उतरेपर्यंत अखंड चालू होते ! या प्रसंगाचा अवधूतने घेतलेला व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वर मला सापडला . अवधूत हा व्हिडिओ घेत असताना मी त्याच्या सोबतच चालत होतो . खाली आल्यावर बाबा जमलेल्या सर्व भक्तांसाठी स्वतः चहा बनवतात . तो प्रसंग देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहिला ! कितीही भक्त आले तरी तो चहा बरोबर पुरतो असा सर्वांचा अनुभव आहे ! आणि तसेच झाले ! आता हा चहा पुरणार नाही असे वाटत असताना चहा पुरून उरला ! इतका उरला की आम्ही सर्वजण तीन तीन कप चहा पिलो ! बाबा शक्यतो एकदाच दहा रुपये कोणाकडून ही घेतात . परंतु मी मात्र पाच-सहा वेळा दर्शन घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांना दहा दहा रुपये दिले . बाबांनी देखील ते घेतले . स्थानिक ग्रामस्थांनी मला सांगितले की हे अजून एक आश्चर्य आहे . कारण बाबा कधीच एका माणसाकडून पुन्हा दहा रुपये घेत नाहीत . या सर्व पैशाचे बाबा काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . तर बाबा प्रचंड दानधर्म करतात . इथे येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद चहा नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था बाबां तर्फे असते . बर बाबा माणसी १० रुपयेच घेत असल्यामुळे जेवढे धन आले तेवढे संपूर्ण किंवा त्याहून जास्तीचा परतावा ते देतात . नुकत्याच बांधून झालेल्या राम मंदिरासाठी बाबांनी साडेचार कोटी रुपये दिले . या परिसरातील अन्य काही मंदिरांच्या बांधकामासाठी जेव्हा लोक देणगी मागायला येतात तेव्हा बाबा कोट्यावधीमध्ये दानधर्म करतात . 

दुर्दैवाने या युट्युब चॅनेल चा एक्सेस आता त्याच्याकडे नाही . परंतु तरीदेखील हे व्हिडिओ कायमचे अजरामर झालेले आहेत .

एकंदरीत श्री सियाराम बाबा यांच्या कृपेचा वर्षाव मला अनुभवता आला ही नर्मदा मातेची माझ्यावरील कृपा आहे . साधू बनून साधना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व तरुणांना माझी नम्र विनंती आहे की एकदा श्री सियाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये राहून त्यांचे जगणे , वागणे , चालणे ,बोलणे , खाणे , पिणे , वावरणे याचा अभ्यास करावा . आणि मग आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा . कारण साधू म्हणून जगणे ही सोपी गोष्ट नाही . प्रसिद्ध संत श्री गोंदवलेकर महाराज असे नेहमी सांगायचे की आयुष्यात काय वाटेल ते करा ,फक्त साधू बनू नका ! 

आता मी बाबांचे दर्शन घेऊन निघणार इतक्यात बाबांनी त्यांच्या शिष्यांना सूचना केली आणि माझाच्या दोन लिटरच्या तीन बाटल्या मला द्यायला सांगितले ! माझ्या अंगावर काटाच आला ! दोन लिटरच्या तीन बाटल्या म्हणजे सहा किलो वजन कोण बाळगणार ! परंतु बाबा सेवेदराला म्हणाले की अरे रिकाम्या तीन बाटल्या दे ! त्याने तीन बाटल्या बाबांच्या पुढे धरल्या बाबांनी त्या बाटल्यांना हात लावला आणि मग त्या बाटल्या त्याने मला दिल्या ! कल्पना करून पहा ! तीन प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या मला देऊन बाबांनी काय साध्य केले असेल !  त्याचे उत्तर मला लवकरच मिळाले ! संतांची कुठलीही कृती निरर्थक नसते . त्या बाटल्यांचा काय उपयोग झाला , त्यांनी काय पराक्रम गाजवला , ते पुढच्या लेखात पाहूया !  बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि दंड उचलला . नर्मदे हर ! परमहंस सच्चिदानंद श्री सियाराम बाबा महाराज की जय ! नर्मदे हर !

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

कोsहम्

सियाराम बाबांच्या इथून शरीर पुढे हलले तरी मन बराच काळ तिथेच होते .बाबांचे व्यक्तिमत्व अतिशय चुंबकीय आहे . ते फारसे बोलत नसले तरी कृतीतून खूप काही शिकवतात . सतत कार्य मग्न राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे . बाबांचा आश्रम सोडल्यावर मी पुन्हा एकदा मैया चा तट पकडला . इथे जबरदस्त झाडी होती . या संपूर्ण परिसरात साळींदर आणि बिबट्या यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे असे मला स्थानिक लोक सांगत होते . अजून तरी या भागात मगरीचा संचार सापडलेला नाही . परंतु चुकून माकून कोणी इथे मगर आणून सोडली तर तिच्यासाठी अतिशय उत्तम असा हा अधिवास आहे . कारण पुढे असलेल्या धरणामुळे येथे पाणी स्थिर आहे . तसेच मानवी वावर अतिशय कमी आहे . शक्यतो कोळी लोकांना मासेमारी करताना त्रास होतो म्हणून ते मगरींचा वावर वाढू देत नाहीत . मगरी त्यांचे मासे देखील खातात आणि मुक्त वावरावर बंधने देखील आणतात . परंतु ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर त्या भागातील जंगल सुरक्षित होते त्याप्रमाणे एक मगर आली की नदीचा कित्येक किलोमीटरचा किनारा सुरक्षित होऊन जातो हे वास्तव आहे . इथे बिल्वकेश्वर महादेवाचे मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो . 

बिल्वकेश्वर महादेव घाट . इथे मैयाचे पात्र अतिशय शांत आणि विस्तृत आहे .

मंदिराचा परिसर असा आहे

 ॐ नमः बिल्वकेश्वराय

नर्मदे काठी प्रत्येक घाटावर छोटी-मोठी अनेक मंदिरे आढळतात . त्या सर्वांचे दर्शन घेत जाणे हा एक आनंदाचा भाग असतो ! प्रत्येक मंदिराचे दर्शन घेताना मी त्या मंदिराचे बांधकाम चालू असताना तिथे असलेल्या वातावरणाची कल्पना करतो ! किती लोकांचा हातभार या मंदिराच्या निर्मितीसाठी लागला असेल हे पाहून धन्य वाटते ! आज मला आनंद मिळावा , मला शांतता मिळावी म्हणून त्यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि कष्ट येथे खर्ची घातलेले असतात . मंदिरातल्या स्थापित देवतेला नमस्कार करताना या सर्वांनाच मी मनोमन नमस्कार करतो .

 हा सर्व परिसर महापुरामध्ये जलमग्न असतो .

या घाटाच्या पुढे गोधारी घाट नावाचा एक घाट लागला

याच्यानंतर मात्र डाव्या हाताला किर्रर्र अरण्य चालू झाले . या भागामध्ये बिबट्या व अन्य हिंस्र प्राणी असण्याची शक्यता मला आतून जाणवत होती . कारण मानवी वावर शून्य असलेला हा भाग होता . आणि वन्य प्राण्यांना असे परिसर खूप आवडतात . शिवाय आपण माणसे चालून ज्या पायवाटा तयार होतात त्या थोड्या मोठ्या असतात .परंतु वन्य प्राण्यांच्या पायवाटा थोड्या-छोट्या असतात . जंगलातून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या अशा पायवाटांची संख्या वाढली की ओळखायचे इथे श्वापदांचा वावर आहे ! अशा ठिकाणी न थांबता वेगाने पुढे निघून जाणे श्रेयस्कर ठरते . त्यामुळे मध्ये एखादा रम्य किनारा मिळाल्यावर थांबणारा मी इथे मात्र अखंड चालत राहिलो . मला कोणी दिसत नसले तरी मी कोणाला तरी दिसत होतो ! हातातील दंड तुम्हाला अशावेळी फार म्हणजे फार उपयोगाचा ठरतो त्यामुळे परिक्रमेला जाताना चांगला मोठा दंड सोबत घ्यावा ! तो केवळ आधारासाठी नाही . तो तुमचा प्राणरक्षक आहे .

या भागातील जंगल कसे आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून गुगल नकाशा आपल्यासाठी जोडत आहे .

 

आपण थेट नर्मदेचा किनारा पहावा . जिथे जमीन आणि नर्मदा भेटते तिथून मी चालायचो . हे जंगल जरी दाट असले तरी एक पाऊल ठेवण्या एवढी जागा सर्वत्र मिळायची . 

अधून मधून असा एखादा गवताचा भाग लागायचा . परंतु डाव्या हाताला जंगल असायचेच .

पुढे पुढे हे जंगल अजून दाट होत गेले . अधून मधून लोक शेती करत असले तरी प्राण्यांना लपून बसता येईल अशी खूप झाडी इथे होती . 

इथे काठाने चालत मी एका नदीपाशी आलो आणि तिने माझा मार्ग अडवला . नदी फारच खोल दिसत होती . जसं जसे तुम्ही एखाद्या धरणाच्या जवळ येता तसतशा नद्या खोल होत जातात . मी तेली गाव सोडले होते . आणि लेपा गावाकडे निघालो होतो . मध्ये या नदीने वाट अडवली होती . वरून एका साधूने मला आवाज दिला म्हणून मी तिकडे गेलो . हा परिक्रमेमध्ये असलेला एक तरुण साधू होता . याचे नाव होते हार्दिक मुनी . वय फार फार तर २२ - २३ असावे . तब्येतीने गुटगुटीत होता . चेहऱ्यावर तेज होते . बोलण्यात हुशारी होती परंतु तितकीच नम्रता देखील होती . अतिशय कृतिशील होता . आणि सोबत फोन बाळगत नव्हता याचा अर्थ खरा साधू होता ! पुढे हा फार मोठे नाव कमावणार असे मला वाटले ! याने मला सांगितले की ही नदी पार करता येणे अशक्य आहे कारण इथे नाव नाही . तसेच नदी पार केल्यावर इतके घनघोर जंगल आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही . त्यापेक्षा इथून मागे थोडेसे चालत गेल्यावर असावड गावाच्या जवळून एक रस्ता जातो जो लेपा बंधार्‍याकडे जातो . परंतु या गावातून सरळ मी चालत गेलो तर वेदा नदीवरचा पूल लागतो तो ओलांडून मी पलीकडे जावे असे त्याने मला सुचवले . परंतु मला नदीच्या काठाकाठाने चालायचे आहे असे मी त्याला निक्षून सांगितले . तो मला त्याच्या छोट्याशा झोपडीमध्ये घेऊन गेला . आणि मला त्या भागातील सर्व परिस्थिती त्याने सांगितली . हा खरे म्हणजे परिक्रमेमध्ये होता . परंतु त्याला हे ठिकाण आवडल्यामुळे इथे चातुर्मास करायची इच्छा झाली . त्यामुळे तो या जंगलामध्ये एकटाच राहत होता . इथे बिबट्याचा मुक्त वावर आहे असे त्याने मला सांगितले . मला ज्या भागातून जायचे होते तिथे बिबटे सतत फिरत असतात असे त्याने सांगितले . कालच इथे मासेमारी करणाऱ्या एका नावाड्याने समोर बिबट्या पाहिल्याचे हार्दिक मुनी म्हणाला . 

नुकत्याच जाहीर झालेल्या प्राणी गणने नुसार मध्य प्रदेश मध्ये भारतातील सर्वाधिक ३९०७ बिबटे आहेत . (मार्च २०२४ ) . असोत .

ही नदी पार करण्यासाठी त्याने स्वखर्चाने साडेचार फूट रुंदीचा एक लोखंडी पूल बनवला होता . हा पूल बनवल्यापासून नदी पार करणे लोकांसाठी खूप सोपे होऊन गेले होते . त्याने मला या पुलापर्यंत जाण्याचा रस्ता समजावून सांगितला . परंतु तो थोडासा क्लिष्ट आहे हे लक्षात आल्यावर तो म्हणाला चला मी तुम्हाला स्वतःच तिथपर्यंत सोडून येतो . आणि माझ्यासोबत तो सुमारे तीन किलोमीटर चालला ! या काळात आमच्या भरपूर गप्पा झाल्या! मला तो मुलगा अतिशय आवडला ! एक आदर्श साधू होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी त्याच्याकडे होत्या . मुख्य म्हणजे वय त्याच्या बाजूने होते ! बाकी सर्व मिळविता येते परंतु वय फक्त गमावता येते ! त्याने बांधलेला पूल छोटा च परंतु अतिशय प्रभावी होता . ही नदी मोठ्या खडकाळ प्रदेशातून वाहत होती . नेमक्या त्यातील एका खडकावर हा पूल त्याने अंथरला होता . बाकी दोन्ही बाजूला फुफाटा होता . या पुलावरून मोटरसायकल सुद्धा जाईल इतका तो मजबूत होता . हा पूल बनवण्यासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला असे त्याने मला सांगितले . हे पैसे त्याने भिक्षेतून वापरले . पुढे गेल्यावर डावीकडे गाव लागते तुम्ही उजवीकडे जंगलाकडे वळा असे त्याने मला सांगितले . याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते . मला अचानक आठवले की ओंकारेश्वरला गजानन महाराज मठामध्ये मला नवे कोरे धोतर शर्ट वगैरे मिळालेला आहे जो मी घालणार नाही ! मी लगेच त्याला ते वस्त्र देऊन टाकले . त्याने देखील मोठ्या आनंदाने वस्त्राचा स्वीकार केला ! पुन्हा याची कधी भेट आयुष्यात होईल का नाही माहिती नाही . हाच भाव चित्तात ठेवून त्याला कडकडून मिठी मारली आणि पुढे निघालो . हार्दिक मुनीची ती हार्दिक भेट कायम हृदयात राहील ! असे आश्वासक ,निस्पृह आणि निरोगी तरुण साधू बनत आहेत तोपर्यंत आपला धर्म अत्यंत सुरक्षित आहे ! पुढे जंगलातील मार्ग सुरू झाला . दुतर्फा भयंकर झाडी होती .

या भागातील वनक्षेत्र कसे आहे हे कळावे म्हणून वरील नकाशा पाहावा ! नर्मदा माता उजवीकडून डावीकडे वाहते आहे . 

इथल्या झाडीमध्ये बऱ्याच वन्य श्वापदांच्या हालचाली जाणवत होत्या . परंतु त्याकडे दुर्लक्ष करत मी नर्मदेचे नामस्मरण करत झपाझप पावले उचलत होतो . या भागातून कोणीही परिक्रमा वासी जात नाहीत हे मात्र खरे . कारण संपूर्ण मार्गात मला कोणीही भेटले नाही . स्थानिक ग्रामस्थ देखील इकडे फिरकत नाहीत . अशा ठिकाणी परिक्रमेचा अधिक आनंद मिळतो ! कारण इथे फक्त दोघेच जण असतात ! तुम्ही आणि मैया !

गावाची हद्द सुरू झाल्यावर हेमंत नामक एक दुकानदार सेवा देतो त्याने चहा बिस्किटे दिली . पुढे विक्रम नावाच्या एका सेवाधारीचा बालभोग घेऊन लेपा गावात  आलो .

 थोडेसे पुढे गेल्यावर एक छोटासा आश्रम लागला .इथे रामाच्या सुंदर मूर्ती होत्या . 

हाच तो लेपा गावातील आश्रम जिथे क्षणभर थांबलो .

 लेपा येथील श्रीराम प्रभू

या आश्रमात थांबण्याचा आग्रह होत होता . परंतु क्षणभर विसावा घेऊन पुढे निघालो . इथून परिक्रमावासी डावीकडे वळतात आणि वेदा नदी पुलावरून पार करतात .मी मात्र लेपा बांध जवळून पाहायचे ठरवले . त्यामुळे बिबट्याचा वावर आहे हे माहिती असून देखील निर्मनुष्य असा नर्मदेचा काठ पुन्हा पकडला . 

थोडेसे जंगल मागे टाकल्यावर अगदी लेपा बांधाच्या जवळ पोहोचलो ! या भागात खूप मोठे मोठे दगड होते . तसेच छोट्या-मोठ्या शिवलिंगांचा खच पडला होता .

लेपा बाँध

धरणाच्या नंतर लगेच डावीकडून नर्मदेला येऊन मिळणारी वेदा नदी . वेदा आणि नर्मदे वरील पूल देखील इथे दिसत आहेत . 

 धरणाचे भव्य वक्राकार दरवाजे दिसत होते . मी उभ्या उभ्या दरवाजे मोजले . 

२७ - २८ मोठे वक्राकार पोलादी दरवाजे होते आणि २९- ३० छोटे दरवाजे होते .मोजताना डोळे फिरायचे इतके ते सुंदर व एकसारखे बांधकाम आहे.

 

लेपा बांध पश्चिमेकडून दर्शन . सर्व काळे वक्राकार दरवाजे उघडलेले आहेत .

परिसर प्रचंड खडकाळ आहे .

धरणाकडे जाणारा काठावरचा मार्ग

निखळ आनंदाने वाहणारी नर्मदा माई !हिच्या ऊर्जेला बांध कोण बरे घालू शकणार !

  प्रचंड पोलाद वापरलेले वक्राकार लोखंडी दरवाजे

हे धरण बांधून पूर्ण झालेले आहे . परंतु या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करायला सुरुवात केली तर सियाराम बाबांचा मठ , बाजीराव पेशवा यांची समाधी आणि अनेक गावे बुडणार आहेत .त्यामुळे या भागातील लोकांनी प्रचंड विरोध करून धरणाचे काम बंद पाडले आहे ते कायमचेच ! मुळात या विषयावर स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर मला असे सांगण्यात आले की ही जागा धरण बांधण्यासाठी योग्य नाहीच आहे . परंतु तत्कालीन सरकारांनी बाजीराव पेशवा यांची समाधी नष्ट व्हावी यासाठी इथे धरण बांधण्याचा घाट घातला .

इतके भव्य दिव्य बांधकाम करण्यासाठी किती खर्च आला असेल विचार करून पहा ! बाजीरावाची समाधी बुडविण्याचे हे सर्व बजेट नर्मदा किनाऱ्यावरील सजग ग्रामस्थांनी पाण्यात बुडविले !

 बाजीराव पेशवा यांचा इतिहास मराठी माणसांना फारसा ज्ञात नसला तरी मध्य प्रदेशातील सर्वच लोकांना त्यांचा प्रचंड अभिमान आहे . 

थोरले बाजीराव पेशवे

 उरी बाजी तानाजीला संस्मरावे . . .

बाजीराव पेशवा यांना ब्राह्मण म्हणून हिणवणे म्हणजे , छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा /कुणबी म्हणून मानणे किंवा नरेंद्र मोदी यांचे काम न पाहता , तेली ही त्यांची जात पाहण्या इतके ते केविलवाणे आणि हिणकस आहे . आज आपण ज्या अखंड हिंदुस्थानात राहत आहोत त्याचे सर्वप्रथम स्वप्न पाहणारे साक्षात शिवछत्रपती होते . आणि त्याच्या कर्तव्यपूर्तीसाठी अत्यधिक झटणारा एक महान योद्धा होता बाजीराव पेशवा . 

लाल खुणेच्या  इथून मी धरण पार केले . पुढे आडवी आलेली वेदा नदी आणि तिच्यावरचा पुल दिसतो आहे .

लेपा धरण बांधूून पूर्ण झालेले असले तरी अजून त्याचा वापर होत नाही ही त्यामुळेच आनंदाची गोष्ट आहे . इथून इंदोर शहराला पाणीपुरवठा गेलेला आहे . तसेच महेश्वर विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती देखील केली जाते . तो समोरच्या तटावरील धरण क्षेत्राचा भाग आहे . सध्या मी इथले रंगीबेरंगी दगड पहात अगदी धरणाच्या पहिल्या दरवाज्यापाशी गेलो . तिथून खरे जर चालत पलीकडे जाता येईल अशी परिस्थिती होती . परंतु काँक्रीटच्या त्या भरावावर किमान अर्धा फूट शेवाळे वाढलेले होते . त्यामुळे चालत जायच्या ऐवजी सटकत जावे लागले असते ! शिवाय पुढे ते पाणी कुठे व कसे पडते आहे याची कल्पना नव्हती . तिथे खडक असण्याची खूप शक्यता होती . उथळ पाणी अधिक अपघातजनक असते . खोल पाणी तुलनेने सुरक्षित असते . त्यामुळे मी शांतपणे धरणाची भिंत तिरकस चढावरून चढलो . धरण चालवण्यासाठी लागणाऱ्या खोल्या , नियंत्रण कक्ष सगळे भिंतीवर होते . आत सर्व यंत्रणा होती . परंतु लोकांनी सर्वत्र तोडफोड केली होती . काचांचा खच पडला होता . बऱ्याच दिवसात तिथे कोणीच आले नसावे हे स्पष्ट जाणवत होते . धरणाचे दरवाजे कायमचे सताड उघडून ठेवलेले होते . धरण बांधून सोडून सर्वजण निघून गेले होते असे जाणवत होते . त्या भिंतीवरून जंगलामध्ये उतरलो . आता वेदा नदी चालत पार करणे एवढा एकच मार्ग माझ्या पुढे होता . कारण तिचा पूल खूप लांब होता आणि तिथवर जायला रस्ता नव्हता . नदीच्या पाण्याला वेग होता . पाण्याचा रंग लगेच वेगळा कळत होता . पिवळसर पांढरट रंगाचे हे पाणी होते आणि नदी विस्तृत आणि खडकाळ होती . पाण्याला प्रचंड गती असली तरी देखील भरपूर शेवाळे वाढलेले होते . नदीचे पाणी थोडेसे गरम होते . साधारण गुडघाभर पाण्यापर्यंत मी नदी पार करायला सुरुवात केली . प्रचंड वेगामुळे पाय थरथरू लागले . परंतु काठीचा आधार घेत मी कसा बसा चालत होतो . एक क्षण असा आला की प्रचंड शेवाळलेला पायाखालचा दगड अचानक घसरगुंडीसारखा उतरू लागला . जिथे उतार होता तिथे पाणी खोल होते . आता काय करावे असा मी विचार करेपर्यंत पाण्याचा एक वेगवान प्रवाह आला आणि माझे दोन्ही पाय सटकून मी पाण्यात पालथा पडलो ! एका क्षणात संपूर्ण भिजलो ! आता पाठीवरील सामान देखील भिजणे क्रमप्राप्त होते ! परंतु मला असे जाणवले की कोणीतरी मला उचलून धरले आहे ! म्हणून पाहतो तो माझ्या पाठीवरील झोळी अथवा सॅक पाण्यामध्ये बुडलेलीच नव्हती !  काठीचा आधार घेत कसाबसा उठलो ! आता पूर्णच भिजलेलो असल्यामुळे पाण्याचे भय निघून गेले ! आणि धावतच नदी पार केली ! सियाराम बाबांनी दिलेल्या तीन रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या मी पाठी जवळ ठेवल्या होत्या !  त्यामुळे माझे दप्तर वेदा नदीमध्ये बुडले नाही ! आणि त्यामुळे आतले सर्व सामान कोरडे राहिले ! बाबांनी घडवून आणलेला हा एक मजेशीर चमत्कार ! संत कुठलीही गोष्ट का करतात याचा आपल्याला त्या क्षणी अंदाजच येत नसतो ! पुढे ते लक्षात येते . नदी पार केल्यावर काठाने पुन्हा चालू लागलो . इथे एक मांत्रिक पाण्यामध्ये एका महिलेला व तिच्या पतीला उभे करून काहीतरी पूजा पाठ करत होता . यामध्ये त्या स्त्रीचे मोकळे केस धरून तिला तो पुन्हा पुन्हा पाण्यात बुडवायचा . ती स्त्री देखील शांतपणे हा अत्याचार सहन करत होती . मी तसाही मातीने माखलेला होतो . त्यामुळे इथे शेजारीच मी स्नान करू लागलो . थोडेसे त्या तिघांच्या जवळ जाऊन फक्त एकदाच खुणेने तिला विचारले की माझी गरज आहे का ? तिने नाही , तु पुढे जा , असे मानेने मला सुचवले . अशी खूप शक्यता होती की तिची इच्छा नसताना बळजबरीने तिला या लोकांनी पकडून येथे आणले असावे . तसे काही असते तर माझी दंड युद्धाची कौशल्ये वापरण्याची संधी मला इथे मिळाली होती इतकेच !परंतु तसे काही नाही हे त्या मातारामने सुचवल्यामुळे मी कोरडी वस्त्रे परिधान केली अन पुढे निघालो . 

अगदी याच ठिकाणी ती तांत्रिक पूजा चालली होती . मी संगमावरचे स्नान इथेच केले .

इथे कोपऱ्यावरतीच वेदवेदेश्वर महादेवाचे मंदिर होते . अतिशय सुंदर असे छोटेसे मंदिर होते . टेकडी चढून वर जाऊन दर्शन घेतले . इथे झाडी पण छान होती . 

प्राचीन श्री वेदवेदेश्वर महादेव मंदिर

इथे खाली परिक्रमावासींना विश्रांती घेता यावी म्हणून एका स्थानिक ग्रामस्थाने झाडाचा पार बांधलेला आहे .

अशी छोटी मोठी सेवा कार्ये  नर्मदा खंडामध्ये अनेक जण आपापल्या शक्तीनुसार बुद्धीनुसार करत असतात .

इथून थोडेसे पुढे गेल्यावर वेदांत विला आश्रम नावाचा एक सुंदर आश्रम आहे . ब्रह्मलीन संत श्री संजय जी वेदांती यांनी हा उभा केला आहे . यांचे नुकतेच दुर्दैवाने पुरी जगन्नाथ यात्रेवरून परत आश्रमाकडे येताना अपघाती निधन झाले होते . त्यामुळे त्यांची समाधी देखील आश्रमाच्या परिसरातच आहे . यांचे वय फार नव्हते . ५० च्या आतच होते . यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून सुमारे १८५०० किलोमीटरचे पदभ्रमण भारतभर केले होते . सायकलवर चारधाम यात्रा केली होती . ऋषिकेश येथून वेदांत विषयात डिग्री घेतल्यावर त्यांनी नर्मदा काठी आधी नयागावचा आणि नंतर माकड खेडा गावातला हा आश्रम स्थापन केला . इथे परिक्रमावस्यांची उत्तम सोय त्यांनी केली आहे . सध्या एक गृहस्थी साधू हा आश्रम सांभाळतात . या आश्रमात सर्वजण पुढच्या दाराने येतात . मी मागून आल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले . इथे पत्र्याची एक मोठी शेड आहे तिथे मी आसन लावले . बाबांनी सुग्रास भोजन प्रसाद वाढला . इथे एक तरुण सुशिक्षित साधू भ्रमणामध्ये आलेला होता . त्याने मला साधू जीवन परिक्रमेच्या व्यतिरिक्त कसे असते याबाबत खूप माहिती दिली . एकंदरीत परिक्रमा हे काही काळाचे साधू जीवन आहे . तर साधूजीवन ही आयुष्यभराची परिक्रमा आहे असे माझे आकलन आहे . एखाद्याला साधू जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल ,परंतु ते जीवन कसे आहे याची कल्पना त्याला नसेल तर त्याला एक छोटीशी झलक देण्याचे काम परिक्रमा करते . जसे आंब्याची पेटी घेण्यापूर्वी आंबे वाला छोट्याशा चाकूने कापून तुम्हाला एक फोड खायला देतो तसा हा प्रकार आहे .त्याचा फायदा असा आहे की ज्यांना हे जीवन झेपत नाही ते नाहक साधू बनून साधूत्वाची गरिमा कमी करत नाहीत .  असो . वेदांत विला आश्रमात सर्व सुख सोयी होत्या . बांधलेले संडास बाथरूम होते . मी वेदांती महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो . गृहस्थी साधूंशी देखील चर्चा केली . बरेचदा तुम्हाला ठरलेले प्रश्न विचारले जातात व त्याची उत्तरे तुम्हाला तोंडपाठ झालेली असतात . तुम्ही कुठून आले ? परिक्रमा कुठून चालू केली ? तुम्ही एरव्ही काय करता ? परिक्रमा कशासाठी उचललेली आहे ? वगैरे हे ठरलेले पठडीतले ठराविक प्रश्न असतात . एक-दोन वाक्यातच या सर्व प्रश्नांचा निफटारा तुम्ही केला की मग मात्र बोलण्यासारखे खूप विषय शिल्लक राहतात . त्यामुळे मी गेल्या गेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन वाक्यात देऊन पुढे त्यांच्याकडून काही विशेष ज्ञान मिळते का याची चाचपणी करायचो . माझ्या पायातील फाटलेले बूट पाहून या साधूंनी मला नवीन चपला दिल्या . हे चपलेचे लखानी कंपनीचे मॉडेल इथे प्रचंड प्रसिद्ध असून सर्वजण अशाच चपला घालतात . याच्या काही स्थानिक डुप्लिकेट येतात . चप्पल म्हटली की सर्वांच्या पायात हीच चप्पल दिसते . पुण्या मुंबईसारखे पायताणांचे सोस इथे पुरवत नाहीत असे माझ्या लक्षात आले . अशा रीतीने परिक्रमेच्या ६१ व्या दिवशी मी मैय्याकृपेने सातवे पादत्राण स्वीकारले ! 

वेदांतविला आश्रमामध्ये प्रस्तुत लेखकाला मिळालेली सातवी पादत्राणे

तत्पूर्वी उडिया परिक्रमावासी मिलन प्रधान ला मी दिलेले लोफर्स . अनवाणी परिक्रमा करू शकलो नाही याचे प्रचंड शल्य माझ्या मनात कायमचे आहे . किती ठिकाणच्या पवित्र मातीच्या स्पर्शाला मी केवळ पादत्राणे घातल्यामुळे मुकलो आहे याची कल्पना आपण करू शकणार नाही . : (

वेदांत विला आश्रमाचे संस्थापक ब्रम्हलीन संत श्री संजय जी वेदांती

आश्रमाचे प्रवेशद्वार

आश्रमाचा परिसर खूप मोठा असून महाराजांच्या अपघाती निधनामुळे इथे एक प्रकारचे औदासिन्य जाणवते .सर्वसामान्य भक्त मंडळी अजून त्या धक्क्यातून सावरलेली नाहीत .होय . संपूर्ण भारतभर पदभ्रमण केलेल्या या संन्यासी महाराजांनी सायकलवरून चारधाम यात्रा सुद्धा केली आहे . परंतु पुरी जगन्नाथ येथून भक्त मंडळीं सोबत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे देहावसान झाले . कर्माचे भोग साधूला देखील चुकलेले नाहीत . फक्त सर्वसामान्य माणसाचा मृत्यू आणि साधूचे मरण यात एक फार मूलभूत फरक आहे . समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये तो सांगून ठेवला आहे . समर्थ म्हणतात ,

म्हणोन साधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ 

जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥

साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला।
हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ 

साधू ने जिवंतपणीच आपल्या जीवनाचे सार्थक केलेले असते . त्यामुळे त्याचे शरीर आधीचेच कारणी लागलेले असते . अशा जीवनमुक्त त्यांनी पुरुषाचे शरीर कुठेही का पडे ना ! तरी तो धन्यच आहे !साधू चा देह अगदी खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर लोकना ते अयोग्य वाटते .परंतु तसे काही नसते कारण साधू मुळातच मुक्त असतो ! असो .

दुपारी चार वाजता माकडखेडा गाव सोडले . आणि काठाकाठाने चालत कठोरा गावात आलो . इथे येईपर्यंत अंधार पडू लागला होता . गावाला एक छोटासा घाट आहे . घाटावरच्या लोकांनी मला सांगितले की गावामध्ये नानकदासजी महाराजांची संजीवन समाधी आहे तिथे मुक्कामाची सोय आहे . जवळच असलेल्या समाधी स्थानी पोहोचलो . स्थान अतिशय जागृत होते . एका मोकळ्या मैदानात समाधी मंदिर होते . समोर महादेवाचे मंदिर होते . शेजारी चार भिंतीवर पत्रा आंथरून परिक्रमावासींची मुक्कामाची उत्तम सोय केली होती . आत मध्ये जमीन दिसणार नाही इतक्या गाद्या घातल्या होत्या . क्षणभर विसावा घेतला . नंतर बाहेर येऊन परिसराचे अवलोकन करू लागलो . शहरातील स्त्रिया साधारण दुपारी चारच्या सुमाराला चहा वगैरे घेऊन टीव्ही तरी लावतात किंवा शॉपिंग वगैरे करण्यासाठी बाहेर पडतात . परंतु खेड्यातील स्त्रिया संध्याकाळी न चुकता पूजेचे ताट घेऊन जवळच्या मंदिरात जातात . मी महादेवाची स्तवने म्हणत बसलेलो असताना कमीत कमी ५० एक स्त्रिया येऊन दर्शन घेऊन गेल्या असतील . प्रत्येकीच्या डोक्यावर पदर असायचा . त्यांचा मुक्त संवाद आणि वावर असायचा परंतु आत मध्ये एक परिक्रमा वासी बसला आहे हे पाहताक्षणी त्या मर्यादशील व्हायच्या .आणि पदर सावरून पाया पडून शांतपणे पूजेला लागायच्या . आपल्या मौनातून अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याची ही पद्धत फारच वेगळी आहे . आश्चर्य म्हणजे साठीच्या पुढच्या स्त्रिया जशा देवाला येत असत तशा तरुण मुली सुद्धा यायच्या . तुलनेने रेवा खंडातील तरुण मुले देवधर्म कमी करतात असे निरीक्षण मी नोंदवित आहे .अर्थात सेवा कार्यामध्ये यांचा हिरीरीने पुढाकार असतोच . फक्त प्रत्यक्ष मंदिरात जाऊन पूजा करण्याचे प्रमाण थोडेसे कमी आहे इतकेच . बहुतांश मुली चांगला पती मिळावा यासाठी महादेवाची आराधना करतात . आणि लग्न झालेल्या स्त्रिया पतीने चांगले वागावे म्हणून महादेवाची आराधना करतात ! एकंदरीत महादेवाची आराधना काही कोणाला चुकलेली नाही ! पुरुष महादेवाची आराधना कमी करताना दिसतात याच्यामागे कदाचित "अशी बायको मला का दिलीस " याचा राग असावा ! अर्थात हा सर्व विनोदाचा भाग आहे हे आपण सर्वजण जाणताच असे गृहीत धरत आहे ! असो . या मंदिरात मी बराच वेळ बसलो होतो . विजवेश्वर महादेव असे या महादेवाचे नाव होते . जव म्हणजे गती . विजव म्हणजे विशेष गती असलेला . विजवेश्वर म्हणजे विशेष गती असलेला देव .

या भागातील काही छायाचित्रे वाचकांच्या माहिती करता देत आहे . सर्व चित्रे गुगल नकाशावरून साभार .

नर्मदा मातेच्या काठावरून दिसणारा नानकदासजी महाराज संजीवन समाधी आश्रम

कठोरा गावातील नर्मदा नदीचे पात्र . इथे खूप खडक आहेत .कदाचित त्यांच्या कठोरपणामुळेच गावाला कठोरा नाव पडले असावे .

कठोरा गावातील निर्मळ नर्मदा मैया

गुरु नानकदासजी महाराज यांची संजीवन समाधी

श्री विजवेश्वर महादेव मंदिर

श्री विजवेश्वर महादेव

परिक्रमावासींची निवास व्यवस्था . याच खोलीत मी मुक्काम केला होता .

देव दिवाळीनंतर नर्मदा परिक्रमा सुरू झाली की इथे अशा रितीने मोठ्या संख्येने परिक्रमावासी उतरतात व मोठ्या मोठ्या पंगती चालतात . परंतु नर्मदा मातेची माझ्यावर अशी असीम कृपा होती ,की इथून पुढे सर्वत्र मी एकटाच होतो .

 थंडी चांगली पडली होती . पत्रे असले की थंडी वाढते .माझे पडल्या पडल्या हवामानाचे निरीक्षण चालायचे . रात्र होईल तशी थंडी वाढत जाते . परंतु मला मात्र थंडी कमी होत असून उकाडा वाढत चालला आहे असे जाणवू लागले . मला मनोमन त्याचे आश्चर्य देखील वाटले . इथे काही साधूंच्या गुहा आहेत असे मला कळाले होते . नुसते बसून राहण्यापेक्षा त्या गुहा पाहून याव्यात असा विचार करून शेजारी असलेल्या एका टेकडीवरील दोन्ही गुहा बघून आलो . गुहा म्हणजे दगडातील गुफा नसून बांधलेल्या बंदिस्त खोल्या होत्या .अत्यंत कचरा व घाण याचे साम्राज्य हे सुचित करत होते की या गुफा अजिबात वापरात नाहीत . दर्शन घेऊन पुन्हा खोलीमध्ये एकटाच बसलेला असताना एक ग्रामस्थ आले . आणि त्यांच्या घरी जेवण्यासाठी येण्याची विनंती मला केली . बाहेर मैदानात मुले खेळत बसली होती . त्यांचा खेळ मी पाहत बसलेला असताना आनंदराम यादव नावाचे हे गृहस्थ आले .परिक्रमेमध्ये कोणाला नाही म्हणणे हा विषय नियमबाह्यच असल्यामुळे त्यांच्या मागोमाग निघालो . यांच्या समोरील घरात राहणाऱ्या शेतकऱ्याने कुबोटा नावाचा मिनी ट्रॅक्टर आजच विकत घेतला होता . माझे ट्रॅक्टरला हात लागावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली . नर्मदा मातेवर लोकांचे किती प्रेम आहे ते अशा प्रसंगातून लक्षात येते . मी देखील त्याच्या ट्रॅक्टरला हात टेकवून डोके ठेवून नमस्कार केला आणि यादवांच्या घरी गेलो . घरी याचे वयस्कर वडील देखील होते . बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या . सुरेख असे घरगुती भोजन त्यांनी दिले . आग्रह हा भारतीय उपखंडाचा जन्मसिद्ध अधिकार आहे ! प्रचंड आग्रह केला जातो ! त्यामागे हेतू हाच आहे की अनाठायी संकोचा पायी कुणी कमी खात असेल तर त्याला अन्न कमी पडू नये . आपल्या पूर्वसुरींनी अतिशय विचारपूर्वक आपली संस्कृती आखलेली आणि बेतलेली आहे . असो . पुन्हा आश्रमामध्ये येऊन महादेवापुढे पुन्हा थोडा वेळ बसलो . या मंदिराला फक्त छत होते भिंती नव्हत्या. त्यामुळे नर्मदेकडून येणारा सुगंधी वारा भावावस्था अधिक गहिरी करायचा . अचानक मृद्गंध येऊ लागला ! आणि पाहता पाहता धुवाधार पावसाला सुरुवात झाली ! नर्मदा खंडामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो ! धावतच खोलीमध्ये गेलो . आणि पडून राहिलो . भल्या पहाटे जाग आली तेव्हा मी उघडाच पडलेला होतो . परिक्रमे मध्ये चालताना इतके श्रम होतात की बरेचदा अंगावर पांघरूण घ्यायच्या आधी झोप लागते . कित्येकदा मी पाणी पिण्यासाठी कमंडलू उघडला आणि तो तसाच हातात धरून झोपी गेलो . सकाळी उठल्यावर पाहिले तर हातात कमंडलू तसाच ! तसेच काहीसे आज झाले . रात्रभर झालेल्या पावसामुळे वातावरण एकदम सुंदर झाले होते ! इथे काठाने खडकाळ भाग अधिक असल्यामुळे सर्व खडक स्वच्छ धुवून निघाले होते ! पावसामुळे निघायला थोडासा उशीरच झाला . पुढे चालत चालत बडगाव आश्रम गाठला .येथे मांडव्य ऋषींची एक प्राचीन ध्यान गुंफा होती . गेली २५ वर्षे इथे एक साधू राहत आहेत . साधू वृक्षप्रेमी आणि स्वच्छताप्रीय होते . आपल्या कुटीमध्ये रामनाम लिहीत बसायचे . त्यांची परवानगी घेऊन गुहेमध्ये जाऊन बसलो . दोन गुणिले दोन फुटाच्या छोट्याशा दरवाजातून आत जाताच समोर दोन मजले होते . एक वर ,एक खाली . वर शिवमंदिर होते तर खाली ध्यानाची खोली होती . आत मांडव्य ऋषींची अजून एक उप गुहा होती .इतकी खोल गुहा असून देखील आश्चर्य म्हणजे आत मध्ये हवा खेळती होती . निरव शांतता ! कुठलाही आवाज आत मध्ये येत नाही ! तुमच्या हृदयाची धडधड फक्त ऐकू येते . नंतर नंतर ती देखील शांत होते . आता तुमच्या मनामध्ये काय वादळे सुरू आहेत तेवढेच तुम्हाला ऐकू येऊ लागतात . बाकी बाहेरच्या कुठल्याही तरंगांचा परिणाम तुमच्या अंतकरणावर होऊ शकत नाही . अगदी नर्मदा मातेचा आवाज देखील आत मध्ये ऐकू येत नाही . कारण गुफा उताराची आणि खोल आहे . अशावेळी तुका म्हणे होय मनाशी संवाद ।आपुलाची वाद आपणासी ।याची अनुभूती नक्की येते ! बसल्या बसल्या कधी डोळे मिटले लक्षात देखील आले नाही . खूपच छान ध्यान लागले . तासाभराने बाहेर आलो . मन संपूर्णपणे निर्विचार झाले होते . मी कोण आहे ,मी कुठे आलेलो आहे , माझे काय सुरू आहे , मला कुठे जायचे आहे , या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे विसर पडला होता . फक्त आणि फक्त शांतता . . शांतता . .शांतता . . .बराच वेळ या शांत अवस्थेमध्ये गेला असावा . साधू महाराजांना या शांततेची सवय असावी त्यामुळे त्यांनी देखील मध्ये व्यत्यय आणला नाही . थोड्यावेळाने टप करून काहीतरी पडले ज्याने माझी ती अवस्था भंग पावली . झाडाला लागलेला एक अप्रतिम आवळा पडला होता ! आजूबाजूला पाहिले तर भरपूर आवळ्यांचा खच पडला होता .आवळे खायला सुरुवात केली . त्याच्या आंबट चवीने भानावर आणले . मैया चे पाणी पिऊन पोसलेले ते आवळे ! आवळ्याला मुळातच आयुर्वेदामध्ये अमृताची उपमा दिलेली आहे ! आणि त्यात हा नर्मदामृत प्राशन केलेला आवळा ! आम्लराजच जणू ! साधू बुवांनी चहा करून आणला . इथे त्यांनी झाडाला एक झोपाळा टांगलेला होता . त्याच्यावर बसून चहाचे झुरके मारत राहिलो . समोर प्रचंड झाडीच्या पलीकडे मैया वाहत होती . अतिशय रम्य असे हे ठिकाण होते . चातुर्मासासाठी अतिशय आदर्श . इथे परिक्रमेदरम्यान आलेल्या एका मराठी माता रामने काही कुटी बांधल्या होत्या . आणि बराच काळ त्या इथे राहिल्या होत्या असे मला साधूने सांगितले . 

मांडव्य ऋषींची गुहा दर्शवणारी पाटी . मी वर उल्लेख केलेल्या साधूंचे नाव राघवजी महाराज असे आहे परंतु यांना सगळे बालकबाबा म्हणून ओळखतात .

गुहेच्या आधी ओढ्यावर एक लोखंडी पुल आहे . परंतु मी हा ही ओढा पाण्यातूनच ओलांडला . त्यात एक वेगळाच आनंद आहे .

आश्रमाकडे जाण्यासाठी सुंदर पायवाट बांधलेली असून सुबक पायऱ्या वर गेलेल्या आहेत .

याच त्या पायऱ्या

आश्रमातल्या कुटींचा पाया . मी गेलो तेव्हा या सर्व कुटी बांधलेल्या होत्या .

आश्रमाकडे जाताना अशी झाडी आहे . परंतु आश्रम परिसरातही अनेक मोठे मोठे वृक्ष आहेत .

हेच ते प्रवेशद्वार जिथून गुहेमध्ये उतरून जाता येते .इथे शक्यतो मुक्त प्रवेश दिला जात नाही .माझ्या सुदैवाने बालक बाबांनी मला आत जाऊ दिले .

मी बसलो होतो ती उप गुहा किंवा कोनाडा

हाच तो झोपाळा यावर बसून मी चहाचा आनंद घेतला . इथे बसून भजनानंद घेणाऱ्या एका संतांचे संग्रहित छायाचित्र . (आपण महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरतो . नर्मदा खंडामध्ये कोणालाही संत अशी उपमा सहज देतात . )

आश्रमामध्ये स्वच्छता करण्यासाठी एक आजीबाई येत असत . त्यांनी देखील खूप गप्पा मारल्या . साधूची मुलाप्रमाणे त्या काळजी घेत . त्यांना काय हवे काय नको ते पाहत . या साधू महाराजांना गावकऱ्यांनी बराच त्रास दिला आहे असे त्यांनी मला सांगितले . मला साधू ग्रामस्थ विसंवादाचे एक महत्त्वाचे सूत्र सापडले आहे . आणि ते सूत्र आहे विसंवाद ! साधू नक्की कसे आयुष्य जगत असतो किंवा जगलेला असतो याची माहिती तो वैराग्य वशात् सर्वसामान्य लोकांना देत नाही . आणि सर्वसामान्य लोक देखील त्यांच्या मनातील साधू विषयक शंकांचे समाधान त्यांच्याकडून करून घेत नाहीत . त्यामुळे हळूहळू ही विसंवादाची दरी वाढत जाते . साधू विषयक भ्रम पसरविणारी विविध माध्यमे देखील त्याला तितकीच कारणीभूत आहेत .मुळात कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणे हेच बऱ्याचशा दुःखांचे मूळ असते . त्यामुळे साधू विषयी अज्ञान असून देखील लोक , 'आम्हाला माहिती आहे तो काय लायकीचा आहे ' वगैरे गैरसमज मनात ठेवून त्याच्याशी वागायला जातात आणि तिथेच वादाची ठिणगी पेटते . हे साधू अतिशय सात्विक होते असे माझे निरीक्षण होते . परंतु सतत एकटे राहिल्यामुळे येणारे काही वैयक्तिक दुर्गुण देखील समाजापुढे प्रकट न करणे साधूला जमले पाहिजे . अन्यथा वादावादी अटळ आहे . आपल्या लहान मुलांना सतत साधूंच्या संपर्कात ठेवावे . लहान मुलांशी ते अतिशय मोकळेपणाने वागतात आणि त्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकवतात . या उलट आपण "तो बुवाजी तुला झोळीत टाकून घेऊन जाईल " वगैरे भीती घालून मुलांना साधू आश्रयापासून वंचित ठेवतो .म्हणूनच लहानपणापासून मुलांवर धर्माचे संस्कार होणे अत्यावश्यक आहे . असा विचार करत मी आश्रमाच्या पायऱ्या उतरत असतानाच समोर एक पिता-पुत्र परिक्रमा वासी भेटले ! आणि जणू काही साक्षात माझ्या या विचाराला नर्मदामाता अनुमोदन देत आहे असे वाटले ! विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय हे मला या पायऱ्यांवर भेटले . यांच्या विषयी पुढे अनेक वेळा लिहिले जाईल . सध्या या दोघांचे दर्शन घ्या इतकेच सुचवेन !

विशाखापट्टणम येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले राजेश प्रजापती आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा तनय . 

या दोघांना भेटून मला अतिशय आनंद झाला ! हे पिता-पुत्र इतके सात्विक होते की विचारू नका ! हे पुढे निघाले होते . परंतु त्यांना मी गुहे विषयी माहिती सांगितली आणि आवर्जून दर्शन घ्यायला सुचवले . दोघेही वर गुहेकडे गेले . आणि मी पुढे मार्गस्थ झालो . वाटेत विशोकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . हा खरगोन जिल्हा होता .


लेखांक ७५ : शालीवाहन ,नावडा टोडी , भव्य सहस्रधारा अन ढालखेडा

कोsहम्

जसा खरगोन जिल्हा सुरू झाला तसे पाण्यातील मोटर्सचे प्रमाण वाढले . इथे ५० -१०० अशा समूहाने मोठ्या मोठ्या अश्वशक्तीच्या मोटर्स लावलेले असायच्या . त्यासाठी तोफे सारखे गाडे बनवलेले असायचे . इथून चालताना फार काळजी घ्यावी लागायची .मोटर साठी जोडलेल्या विद्युत तारा बरेचदा उघड्या असायच्या . त्यांचा चिखलाला स्पर्श झाला की जमिनीमध्ये विद्युत प्रवाह उतरायचा . अतिशय सावधपणे हा टापू पार करावा लागायचा . खाली माजलेला चिखल चुकविण्यासाठी मोटर मधून येणारे मोठे मोठे पाण्याचे नळे तुडवत चालावे लागायचे . त्याच्यावरून पाय सटकण्याची भीती असायची . त्यामुळे समोर मोटर दिसल्या की अंगावर काटाच यायचा ! 

इथे तशी काठावर फारशी शेती नव्हती . परंतु आत मध्ये लांब लांब पर्यंत शेतात नर्मदेचे पाणी नेले जायचे . त्यामुळे मोटर्स ची संख्या जास्त होती . शिवाय इथे नर्मदेची पाणी पातळी कमी जास्त होत असल्यामुळे मोटर खूप लांब ठेवलेल्या असायच्या .या भागात वाळू उपसा देखील फारसा कुठे नव्हता . खडकाळ प्रदेश होता . मध्ये एका पुलावर पाकोळ्यांची अक्षरशः हजारो घरटी दिसली होती . त्यांच्या आवाजाने मैयाचा काठ दुमदुमला होता . पाण्याच्या मोटर्समुळे माजलेला चिखल या पाकोळ्यांसाठी घर बनवण्याचा उत्तम कच्चामाल ठरत होता . त्याचे गोळे बनवून त्या न्यायच्या आणि ते लाळेत मिसळत चिकटवून घरटी बांधायच्या . 

नराने अर्धे घरटे बांधले की मादी येऊन पाहणी करते . तिला घरटे आवडले तर संसार थाटला जातो आणि घरटे पूर्ण होते . अन्यथा अर्धवट सोडले जाते . बिचाऱ्या पाकोळ्यांना सुद्धा हा कर्मभोग चुकलेला नाही !

इंग्रजीमध्ये याला कॅमोफ्लाज म्हणतात .

आज काठाने चालताना खूप आनंद येत होता . काल झालेल्या पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा होता . भरपूर अंतर चालल्यावर उजव्या हाताला महेश्वर चा घाट दिसू लागला ! माझ्यामते हा जगातील कुठल्याही नदीवरील सर्वात सुंदर घाट आहे !मला त्याचे दर्शन आयुष्यात प्रथमच घडत होते ! डावीकडे एक अतिशय आलिशान हॉटेल बांधलेले आहे . हॉटेल आराम बाग माहेश्मती असे त्याचे नाव आहे .मी आत मध्ये गेलो कारण आधी मला वाटले की हा कुठला तरी आश्रम दिसतो आहे . परंतु ते एक तारांकित हॉटेल आहे कळल्यावर मी पुन्हा काठावर आलो . इथून महेश्वर घाटाचे सुंदर दर्शन होते .

 

आराम बाग हॉटेल माहेष्मती

बाहुबली चित्रपटात माहिष्मती हे नाव सर्वांनी ऐकले असेल . प्रत्यक्षात महेश्वर नगरीचे हे प्राचीन नाव आहे .

 ( संग्रहित छायाचित्र )

 (हॉटेलच्या खोलीतून दिसणारा महेश्वर घाट )

इथे परिक्रमावासींची सेवा केली जात नाही . परंतु कुणाला पर्यटना निमित्त जायचे असेल तर माहिती असावे म्हणून हॉटेलची माहिती दिली . असो . इथून लगेच पुढे गेल्यावर शालिवाहन घाट लागतो . शाली म्हणजे घोडा . शालिवाहन म्हणजे घोडेस्वारी जाणणारा राजा . आपल्या देशावर शक कुशाण हूण अशा अनेकांनी बाहेरून येऊन राज्य केलेले आहे . आपण जे शालीवाहन शक पाळतो तो शक-कुळातला असा पहिला राजा होता ज्याच्याकडे घोडदळ होते . त्यामुळे आपण त्याला शालीवाहन शक म्हणू लागलो . मात्र हे लोक आपल्या संस्कृतीशी तादात्म्य पावले व अन्य काही लोक अजूनही स्वतःचे वेगळेपण जपून आहेत इतकाच फरक आहे . इथे एक अतिशय सुंदर असे शिवमंदीर होते . मंदिराला दोन मंडप होते . नंदी मंडपा मधला नंदी अतिशय सुंदर होता . मंदिर पुरातन होते . मंदिराच्या कट्ट्यावर बसल्यावर महेश्वर घाट अतिशय सुंदर दिसायचा . मी बराच काळ तिथे बसून होतो . अतिशय शांतता संपूर्ण परिसरामध्ये व्यापून उरलेली होती . 

मंदिराच्या मागे मोठे मैदान होते व त्याच्यापुढे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी बांधलेला एक आश्रम होता . इथून मला आवाज दिल्यावर मी तिकडे गेलो . अंधाऱ्या खोली मध्ये आसन लावले . सेवाधारी साधूने मस्तपैकी फोडणीचा भात खायला घातला . माझ्या अपेक्षेप्रमाणे तो मराठीच निघाला ! परंतु मराठी मध्ये बोलत नसे . 

श्रीशालीवाहनेश्वर महादेव मंदिर . मंदिराची मैयाकडील बाजू .

श्री शालिवाहनेश्वर महादेव

आश्रमाच्या परिसरातील सुरेख झाडी

हाच तो सुंदर नंदीकेश्वर

मंदिराची आश्रमाकडील बाजू

इथे परिक्रमा वासींना भोजन प्रसाद दिला जातो . 

शालिवाहन घाटावरून दिसणारा महेश्वर घाट

इथे देखील मोटारींचे जंजाळ आहेच ! मोटर्स त्याच्या वायर्स आणि पाणी नेणारे नळे यांचे जाळे पहा .इथल्या नावा शिकारासारख्या केलेल्या दिसतात .

महेश्वर घाट डोळ्याचे पारणे फेडणारा आहे ! पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची समाधी देखील आपल्याला इथून दर्शन देते . या महान साध्वीचे उपकार आपल्या कातड्याचे जोडे करून तिला घातले तरी फिटणार नाहीत . 

क्षणभर विश्रांती घेतली आणि झोळी उचलली .  इथून पुढे थोडेसे चालल्यावर नावडाटोडीचा घाट लागतो . नावडा टोडी हे नावाड्यांची टोळी असे सुचित करणारे नाव आहे . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये जेवढे म्हणून केवट आहेत , नावाडी आहेत त्या सर्वांचे एक वार्षिक संमेलन या गावामध्ये भरते . गंमत म्हणजे त्या संमेलनासाठी बहुतांश नावाडी आपापल्या नावा घेऊन येतात . केवट लोकांचे हे सर्वात महत्त्वाचे संमेलन आहे . अनेक महत्त्वाचे निर्णय इथे घेतले जातात . इथे मला एक केवट भेटला ज्याने माझी चौकशी करून काही फोटो देखील काढले . मी सांगितलेल्या क्रमांकावर त्यांने ते फोटो पाठवून दिले . 

 नावडा टोडी घाटावर उभा प्रस्तुत लेखक . मागे विस्तीर्ण महेश्वर घाट

 त्वदीय पादपंकजं नमामि देवि नर्मदे !

त्या दिवशीचा महेश्वर घाट

 नावडा टोडीचा घाट

या भागातील नौका मुख्यत्वे करून अशा आहेत .मागे जोडलेले इंजिन पहावे .

केवट समाज नर्मदेमधील चैतन्य आहे

आज काल अशा साच्यातून काढलेल्या फायबर च्या नावा देखील बघायला मिळतात .

इथून पुढे सहस्त्रद्वारेपर्यंत मैया उथळ व विस्तीर्ण होत जाते . त्यामुळे इथे पक्षी जीवन चांगले आहे .

इथून महेश्वर कडे पाहताना मध्ये एका बेटावर महादेवाचे मंदिर दिसते . हे बाणेश्वराचे मंदिर आहे . याचे वैशिष्ट्य असे आहे की हे पात्राच्या मधोमध आहे . त्यामुळे परिक्रमा वासी इथे जाऊ शकत नाहीत . परंतु आजपर्यंत हजारो पूर झेलून देखील हे मंदिर एकही दगड न हलता उभे आहे ! यावरून भारतीय स्थापत्यशास्त्र किती उच्च कोटीचे होते याचा अंदाज जगाला येतो ! वर्षातील बहुतांश काळ हे मंदिर जलमग्न असते .

श्री बाणेश्वर मंदिर . इथे फक्त नावेनेच जाता येते .

अत्युत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना ,श्री बाणेश्वर महादेव

धरणातून पाणी सोडले की मंदिराच्या पातळीला पाणी येते . पाणी उतरले की असे असते . मंदिराच्या चबुतऱ्याचा एक दगड देखील पाण्यामुळे हललेला नाही .वास्तुविशारदांनी या मंदिराचा अवश्य अभ्यास करावा .

  बाणेश्वराच्या या दर्शनी भागाने नर्मदेचे किती पूर , महापूर पाहिले असतील याचे गणित लावता येणे कठीण आहे . 

बाणेश्वर मंदिरातून दिसणारा शालिवाहन घाट .

पुण्यातील बाणेर गावात देखील बाणेश्वराचे शिवलिंग आहे . इथे एका नैसर्गिक गुहेमध्ये  हे शिवलिंग आहे . नर्मदे काठी सापडणाऱ्या शिवलिंगांना सर्वसाधारणपणे बाण असे म्हणायची पद्धत आहे . धनुष्यबाण या शब्दा मधील बाणाशी याचा काही संबंध नाही . तर भेडाघाट जवळ नर्मदेला बाण नावाची एक नदी येऊन मिळते . ही सर्वाधिक गुळगुळीत गोटे नर्मदेला आणून वाहते . म्हणून नर्मदेतील गोट्यांना बाण म्हणायची पद्धत पडली आहे . रमेश जाधव सारखे तज्ञ लोक हा गोटा नर्मदेतील आहे का बाण नदीचा आहे हे ओळखू शकतात . असाच बाण नदीतला एखादा सुबक शिवलिंगाचा आकार सापडला की त्याला बाणेश्वर असे नाव दिले जाते . बाकीचे नर्मदेश्वर असतात . असो .

इथून पुढे काठाने चालल्यावर नर्मदेची नितांत सुंदर सहस्त्रधारा लागते .इथे नर्मदेचे पात्र अक्षरशः हजारो धारांमध्ये विभागले गेलेले आहे . हा संपूर्ण खडकाळ टापू आहे . इथे नुकतीच कयाकिंग ची स्पर्धा होऊन गेली होती . खेलो इंडिया अंतर्गत इथे कयाक स्पर्धेचे अर्थात एकल नौकानयन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते . या काठावरून त्या काठावर ताणून केबल बांधल्या होत्या . त्याला लाल पांढरे चट्टे पट्टे असलेल्या काठ्या लटकवल्या होत्या . या काठ्यांना स्पर्श करत प्रवास करायचा असतो . पाण्याचा प्रवाह भयंकर होता . त्यामुळे ही स्पर्धा खरोखरीच खूप साहसी लोकांसाठीच आहे . मुख्यत्वे करून केवट समाजातील तरुण याच्यामध्ये जास्त भाग घेतात . त्यांना जन्मतःच पाण्याची भीती नसते . तसेच पाणी कुठे खोल आहे कुठे उथळ आहे याचा त्यांना जन्मजात अंदाज असतो . मी इथे बराच वेळ बसलो . सहस्त्रधारेचा विराट आवाज सर्वत्र दुमदुमत होता . इथे नर्मदेच्या मध्ये एक बेट तयार झालेले असून त्याच्या चहुबाजूने नर्मदा वाहते . तिच्या अनेक शाखा इथे दिसतात . त्या विविध दिशांना वाहतात . ही शाखा तर चक्क उलटी फिरुन पुन्हा नर्मदेला येऊन मिळताना दिसते . नर्मदेच्या मध्येच तिचाच एक प्रवाह पुन्हा उलट दिशेला वाहताना कसा दिसत असेल कल्पना करून पहा !

सहस्त्रधाराकुंडाचे उपग्रह छायाचित्र . यातील उलटी धारा कशी आहे ते तुम्हाला आता दाखवतो .

वरील चित्रात केशरी रंगाने दाखवलेली धारा नर्मदेच्या उलट दिशेला वाहताना दिसते . नर्मदा रिव्हर राफ्टिंग पॉईंट लिहिले आहे त्याचे चित्रे खाली देत आहे .म्हणजे तुम्हाला भौगोलिक स्थानाचा अंदाज येईल .

 इथे मला एक अतिशय सुंदर बाण सापडला . या नैसर्गिक बाणावर कैलास पर्वतासारखा आकार उठलेला होता . तसेच ॐ आकार देखील यावर दिसत होता .

 

सहस्त्रधारेपाशी मिळालेला हाच तो बाण . हा पुढे मी नित्यपूजेत ठेवला .

इथे मला अजून एक अर्धनारी नटेश्वर सापडला . ज्याच्यावर गणपतीच्या मुखाचा आकार नैसर्गिकरित्या उठला होता आणि गळ्यात हार घातल्यासारखा भास होत होता .

दिव्य सहस्त्रधारेचे समोरच्या तटावरून काढलेले चित्र .

नावाप्रमाणे सहस्त्रधारा दिसतात

इथे प्रत्येक फुटावर नर्मदेचे रूप बदलत जाते

पाण्याचे सर्वच प्रवाह अत्यंत गतिमान आहेत

खळाळणारे हे नर्मदा जल तुमच्या खळाळणाऱ्या मनाला शांत करते .

कयाकिंग अथवा रोईंगच्या स्पर्धेसाठी सहस्त्रधारेमध्ये लावलेले मार्कर्स . हाच तो 'रिव्हर राफ्टिंग पॉईंट ' .

अशा रीतीने त्या दोन खुणांच्या मधून आपली नौका न्यायची असते . 

आपली कयाक नौका घेऊन मार्कर हिट करताना खेळाडू . कार्बन फायबर पासून बनविलेल्या अशा नौका समोरच्या महेश्वर घाटावर खूप दिसतात . तिथे यांचा एक क्लबच आहे . समोरच्या तटावर गेल्यावर आपण तो पाहणार आहोत . 

हा खेळ अत्यंत साहस , शक्ती , युक्ती , चिकाटी ,एकाग्रतेचा असून प्रसंगी जीवघेणा देखील आहे .

या कट्ट्यावर मी बराच वेळ बसलो होतो

स्पर्धेच्या वेळी थोडे अधिक पाणी असते

अशा रीतीने मार्कर अडकवलेले असतात

स्पर्धेसाठी असे तात्पुरते शामीयाने उभे केले जातात . 

कार्तवीर्यार्जुन या सहस्त्र बाहू राजाने आपल्या हजार बाहुंनी नर्मदा इथे अडवली होती . म्हणून ती शतखंडित झाली असे मानले जाते . परशुरामाने इथेच त्याला मारले . त्यामुळे त्याची समाधी महेश्वर घाटावर आहे . असो .

इथे एक अद्भुत दृश्य मला पाहायला मिळाले . मध्ये तयार झालेल्या बेटावर भरपूर गवत आहे . ते खाण्यासाठी या काठावरची गुरे तिकडे जातात . जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्यामुळे पोहत जातात . आणि पोहतच परत येतात . ही गुरे परत कशी येतात ते मी तिथे थांबून पाहिले . साधारण पन्नासेक गुरे होती . मी वरती उल्लेख केला त्याप्रमाणे नर्मदा मैया चा एक उलटा प्रवाह तिथे वहातो .त्या प्रवाहातून ती पोहत आली आणि मूळ धारेला लागली . शंभर दीडशे मीटर रुंदीचे पात्र पार करायला त्यांना सुमारे पाचशे मीटर पोहावे लागले ! पुढे एके ठिकाणी सर्व गुरे काठाला लागली ! त्यांच्या मागोमाग गुराख्याने देखील पाण्यात उडी मारली . तो देखील एका गायीची शेपटी धरून काठाला लागला . परंतु त्या सर्व गुरांची ती चिकाटी पाहून मला खूप कौतुक वाटले . फक्त देशी गाय बैलच हा पराक्रम करू शकतात असे मला त्या गुराख्याने नंतर गप्पा मारताना सांगितले . त्याच्याकडून मी ही सर्व प्रक्रिया समजून घेतली . गेली अनेक वर्षे त्यांचा हा उपक्रम नित्य चालू आहे . विशेष म्हणजे छोटी वासरे देखील पोहत होती . रावेरखेडीनंतर इथे मी गुरे पोहताना पाहिली . तिथे पाणी तुलनेने संथ होते . येथे मात्र भयानक वेगाचा प्रवाह आहे . खोली सुद्धा खूप आहे . मध्ये अध्ये चित्रविचित्र खडक आहेत . ते सर्व धोके टाळून जनावरे पोहत होती . गुरांना शाबासकी देऊन पुढे निघालो . परंतु इथे स्नान करण्याचा मोह होऊ लागला . सहस्रधारा म्हणजे धुवाधारचीच भव्य प्रतिकृती . इतक्या धारा होत्या की मन मोहून गेले . खडकातून वाहणारी स्वच्छ मैय्या ! यथेच्छ स्नान केले ! अतिशय स्वच्छ आणि थंडगार पाणी होते ! काळा कुळकळीत चमकदार खडक पायांना अल्हाददायक होता . पाणी अतिशय खोल होते . परिसर निवांत , निर्मनुष्य होता .

काठावरील दगड गोटे अतिशय गुळगुळीत आणि तुळतुळीत आहेत .

इथे ढालखेडा नावाचे एक गाव लागले . गावामध्ये नर्मदेच्या काठावरच अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे . मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . इथे गावातील काही तरुण गप्पा मारत बसले होते . त्यांनी मला सांगितले की पुढे एक नवीन परिक्रमावासी सेवा क्षेत्र निर्माण झाले आहे तिथे मी जावे . तिथे रामायण कथा देखील सुरू होती . 

अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील नर्मदातट

मंदिराकडे जाणारा रस्ता

क्षणभर या पारावर विसावा घेतला

अन्नपूर्णा माता मंदिराचे प्रवेशद्वार

ह्याच कठड्यावर गावातील तरुण गप्पा मारत बसले होते . या सर्व तरुणांना परिक्रमे विषयी खूप आस्था होती .

अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेतल्यावर गावातील रस्ता पकडला आणि परिक्रमावासी सेवाक्षेत्रपाशी आलो . एका ओसाड माळाच्या खाली एका झाडाखाली हा आश्रम बांधला होता . नुकतेच बांधकाम झाले होते आणि रामायण कथेने आश्रम सुरू करण्यात आला होता . गावातून भरभरून कन्या गोळा करून भोजनासाठी घेऊन जाणारे टेम्पो मी पाहिले . जाताना सर्व कन्या नर्मदे हर आवाज देत होत्या ! त्यांच्या मागोमाग आश्रमावर पोहोचलो . एक मराठी साधू आश्रम चालवीत होता . 

हाच तो ढालखेडा आश्रम

आश्रमाच्या बाहेर अंगणामध्ये अगदी याच ठिकाणी मी आसन लावले . 

आश्रमाविषयी अधिक माहिती

 घोटू बाबा अन्नक्षेत्र असे आश्रमाचे नाव होते . नर्मदा खंडातील नावे मोठी रंजक असतात . 

आश्रमाच्या बाहेर अंगणात अशा पंगती बसायच्या .

या आश्रमामध्ये मला खूप लोक भेटले . विशाखापट्टणम येथून परिक्रमेला निघालेले पिता-पुत्र राजेश प्रजापती आणि तनय इथे मुक्कामी थांबले होते . त्यांच्यासोबत दोन नागा साधू होते . एक अतिशय तरुण होता आणि एक वयस्कर होते . पैकी वयस्कर साधूला कुठेतरी पाहिले आहे असे सारखे मला वाटत होते . तरुण साधू खूप विनोदी स्वभावाचा होता . अतिशय बारीक अंगयष्टी असलेला तो साधू अतिशय चपळ विद्वान आणि हुशार होता . विशेषतः हिंदी भाषेवर त्याचे फारच चांगले प्रभुत्व होते . इथे अजून एक कानफाट्या गोसावी आला होता . याने याच वर्षी संन्यास घेतला होता . त्याचे वय साधारण १८ ते २० वर्षे असावे . तब्येत मजबूत होती . म्हातारा नागा साधू त्याची सारखी खेचत होता . त्यामुळे तो मुलगा वैतागला होता . आता विषय निघालाच आहे तर प्रजापती पिता-पुत्रांविषयी थोडेसे सांगतो . राजेश प्रजापति हा कॉर्पोरेट मनुष्य होता . मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला प्रजापती नोकरी निमित्त विशाखापट्टणम मध्ये स्थिरस्थावर झाला होता . एच एस बी सी नावाच्या बँकेत एका मोठ्या ग्लोबल कम्प्लायन्स युनिटचा तो प्रमुख होता . प्रचंड पगार होता . घरात सर्व सुख सुविधा होत्या . दारू-मटण-पार्ट्या यात आयुष्य मजेत चालले होते . नर्मदा हा शब्द देखील त्याला महिन्याभरापूर्वी माहिती नव्हता . परंतु कुठेतरी आत मध्ये असे जाणवत होते की आपल्याला काहीतरी कमी पडते आहे . ते नक्की काय कमी पडते आहे हे त्याला कळत नव्हते .म्हणून एक दिवस बसल्या बसल्या युट्युब वर तो व्हिडिओ चाळत होता . अचानक नर्मदा परिक्रमा या विषयावरचा एक व्हिडिओ त्याच्या पाहण्यात आला . स्वतः राजेश प्रजापती सांगतात त्याप्रमाणे त्यांना नर्मदा हे नाव देखील माहिती नव्हते . परंतु त्या व्हिडिओने त्यांना वेड लावले . यानंतर नर्मदा परिक्रमा या विषयावरती त्याने संशोधन चालू केले .आणि हळूहळू लक्षात येऊ लागले की हीच एक गोष्ट करायची राहिलेली आहे .आणि हीच गोष्ट आयुष्यातला परमोच्च आनंद मिळवून देणार आहे ! अपेक्षेप्रमाणे घरी पत्नीकडून विरोध झाला . मुलाला कोण सांभाळणार ? पगार पाण्याचे काय वगैरे वगैरे . राजेशने निर्णय घेतला की मुलाला म्हणजे तनयला घेऊन परिक्रमा करायची .आणि

पैसा प्रॉपर्टी चा प्रश्न येऊ नये म्हणून आपली सर्व प्रॉपर्टी त्यांनी विकून टाकली . त्याचे पैसे पत्नीच्या हातात टेकवले आणि तिला माहेरी पाठवून दोघांनी घर सोडले ! किती मोठा निर्णय आहे पहा ! हा घेता येणे सोपे नाही ! राहिला प्रश्न तनयच्या शिक्षणाचा तर तो नर्मदा मातेने कसा सोडवला याचा मी स्वतः साक्षीदार आहे ! तनयची मातृभाषा भोजपुरी . घरी बोलायचे हिंदी . बाहेर चालायचे तेलुगु . आणि शाळेत शिकायचं इंग्रजी . यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झालेली ! त्यातल्या त्यात इंग्रजी वगळता अन्य भाषा त्याला फारशा लिहिता वाचता बोलता येत नव्हत्या. परंतु माझ्यासमोर त्या तरुण साधूने तनयला तुलसी रामायण वाचायला शिकवले . त्या साधूला तुलसी रामायण पाठ होते . अक्षर ओळख माझ्यासमोर ढालखेडा अक्षरांमध्ये करून दिली . पुढे बराच काळ मला हे लोक भेटत राहिले . आणि तनय किती गतीने रामायण वाचायला शिकला आणि त्याचा अर्थ देखील सांगायला शिकला हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे . तीनच दिवसात तो हिंदी वाचायला शिकला . हिंदी म्हणजे आजचे हिंदी नव्हे , तर जुने हिंदी अथवा अवधी अशी ती भाषा आहे . परंतु तनय त्या भाषेमध्ये तरबेज झाला ! घरी राहून शाळेत जाऊन हे सर्व शिकायला तीन वर्षे आरामात जातील ! गुरुकुल पद्धतीचे शिक्षण श्रेष्ठ कसे व का आहे हे मी स्वतः येथे अनुभवले . राजेश आणि तनय यांच्यामध्ये अतिशय सुंदर असा सुखसंवाद व्हायचा . तनय या साधूं सोबत शास्त्र चर्चा करायचा . आधुनिक तर्कशास्त्र अधिष्ठित पद्धतीने शिकलेला असल्यामुळे त्याला शंका कुशंका फार होत्या . कधी कधी त्याची उत्तरे देताना साधूंची भंबेरी उडायची ! त्यांचा हा वादविवाद पाहायला मला फार मजा यायची ! ढालखेडा आश्रमामध्ये तर म्हातारा नागा साधू त्याच्यावर इतका उखडला होता की त्याला शाप द्यायला निघाला होता ! तरुण साधूने झडप घालून त्याला शांत केले ! एकंदरीत सर्व प्रकार मजेशीर होता ! तनय परिक्रमेमध्ये जे काही शिकेल ते बाहेर कुठेही शिकणे शक्यच नाही ! तेरा वर्षे असे त्याचे वय होते . इंग्रजीमध्ये twelve नंतर thirteen येते.इथून पुढे Nineteen पर्यंत प्रत्येक आकड्याच्या स्पेलिंगच्या अखेरीस teen हे शब्द येत असल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांना इंग्रजी मध्ये टीनेजर असे म्हणतात . नेमक्या याच वयात तो योग्य ठिकाणी आला होता . प्रत्येक पाऊल ,प्रत्येक व्यक्ती ,प्रत्येक ठिकाण ,प्रत्येक देवस्थान , प्रत्येक आश्रम ,प्रत्येक धर्मशाळा , प्रत्येक ऋतू ,प्रत्येक दिवस त्याला काही ना काही नवे शिकवून जात होता . त्याच्या प्रगतीचा आलेख मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला ! अनुभवला ! तसा हा मुलगा गुटगुटीत होता . इंग्रजीमध्ये ज्याला ओबीज़ म्हणतात असा तो होता असे त्याच्या वडिलांनीच मला सांगितले .परंतु परिक्रमेमध्ये त्याची तब्येत देखील सुधारली . दिवसागणिक तो प्रगल्भ होत गेला . त्याला मी प्रेमाने तनु म्हणायचो . त्याला देखील माझा लळा लागला होता कारण त्याला उत्तरे कुठल्या पद्धतीने द्यावीत याचा अंदाज मला होता . शहरी जीवनाचा स्पर्श झालेला तो बालक होता . एकंदरीत हे चौघे सतत शास्त्र चर्चा करत परिक्रमा करीत होते . या चौघां पैकी तिघांचे पुढे एक ठिकाणी छायाचित्र काढले गेले . आपल्यासमोर व्यक्तिरेखा उभ्या राहाव्यात म्हणून इथे देतो आहे . 

 प्रस्तुत लेखक , नागा साधू , राजेश प्रजापती , तनय प्रजापती

साधूंच्या कुठल्याही मताशी या दोघांचे काही मतैक्य शेवटपर्यंत झाले नाही ! तिथेच मस्तपैकी पूजा वगैरे आटोपून भोजन केले .इथे रामायणाचा भंडारा घेतला . जमनादास नामक फलटणचा मराठी त्यागी साधू हा आश्रम चालवत असे . ग्रामस्थ आश्रम चालवायला त्याला मदत करत असत . बाबांच्या सात परिक्रमा झालेल्या होत्या . या गावांमध्ये मुख्यत्वे करून राजपूत समाज होता व सर्वजण झटून सेवा करत होते . धर्मपालनाच्या बाबतीत राजपूत लोक अतिशय काटेकोर असतात असे मला जाणवले . मी मगाशी उल्लेख केला तो नागा साधू आणि कानफाट्या गोसावी यांची कुरबुर चालूच होती . गांजा ओढण्यासाठी सर्वजण जेव्हा बसले तेव्हा गांजा मळता येत नाही म्हणून कानफाट्या गोसावी ला नागा साधूने बरेच झापले . कानफाट्या गोसावी अतिशय वैराग्यशील होता . इतक्या थंडीमध्ये देखील त्याने फक्त कमरेला एक बिबट्याचे कातडे असते तशी नक्षी छापलेले कापड गुंडाळले होते . बाकी तो उघडाच होता . माझे त्या नागा साधूकडे सारखे लक्ष लागले होते . त्याला कुठे पाहिले आहे ते मला आठवत नव्हते . त्याचे बोलणे ,त्याचे हसणे ,त्याचा आवाज सर्व परिचित वाटत होते . मी त्याच्याकडे पाहतो आहे हे साधूच्या लक्षात आले . तो मला म्हणाला आप यही सोच रहे हो ना की इस बाबा को पहले कहा देखा है ! मी म्हणालो जी महाराज . साधू मला म्हणाला याद करके देखो मेरे जैसा दिखने वाला कोई आदमी तुमने कही देखा है क्या । मी आठवू लागलो . साधू म्हणाला वैसे मैं किसी को कभी बताता नही । लेकिन तुम कबसे घूर रहे हो इसलिये बता देता हु । मै जनरल व्ही के सिंग का भाई हू । हम छह भाई है । भैय्या पहले फौज में फिर राजनीति मे गये ।और मै साधू बन गया । आता मला सर्व संगती लागली .या दोघांच्या चेहऱ्यात , हसण्यात , बोलण्यात खरोखरच साम्य होते .  आता तो खरोखरीच त्यांचा भाऊ होता का नव्हता हे फक्त मैयालाच माहिती . परंतु मला साम्य जाणवले खरे . 

जनरल व्ही के सिंग

या साधूच्या वागण्यात देखील एक प्रकारचा रुबाब , आदब ,करारीपणा होता . आम्ही पुन्हा झोपायच्या ठिकाणी आलो . इथे रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा एकदा तनय आणि साधू यांची शास्त्र चर्चा चालली ! रामायण पाठ असलेला साधू आणि मी खूप हसायचो . त्या वादविवादाचा आनंद घेत झोपी गेलो . उघड्यावर झोपताना कुत्र्यांपासून सामान जपावे लागायचे . पादत्राणे , सामान ,पूजा साहित्य ,सोबतचा खाऊ इत्यादी चोरून , फोडून खाणे कुत्र्यांना आवडायचे . सगळेच सामान पांघरूणामध्ये घेऊन आम्ही झोपायचो . सकाळी उठल्यावर कानफाट्या गोसावी या साधूं सोबत चालणार होता . त्याला हळूच बाजूला घेऊन मी नर्मदेच्या काठाने चालण्याचे आणि एकट्याने चालण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याच्या पायामध्ये पादत्राणे नव्हती . हातामध्ये काठी नव्हती . सोबत झोळी नव्हती . फक्त कमरेला गुंडाळलेले व्याघ्र चर्म इतकेच त्याचे सामान होते . त्याला मी तीन महत्त्वाच्या गोष्टी मनावर ठसाविल्या . एक : कधीही गांजा च्या आहारी जाऊ नकोस .

दोन : काठाकाठाने परिक्रमा कर .

तीन : एकट्याने परिक्रमा कर .

तिथून तो जे सुटला तो त्याने थेट काठच गाठला . पुढे मला बराच काळ त्याची पावले काठावर सापडत होती . मातीमध्ये चिखलामध्ये त्याचे पाय उठलेले मला दिसायचे . त्याने शेवटपर्यंत किनारा सोडला नाही याचा मला आनंद वाटला . बलगांव गावामध्ये एक सुंदर आश्रम होता तिथे मी पोहोचलो . मौनी बाबांचा आश्रम असे त्याचे नाव आहे . इथे मोठ्या प्रमाणात गोसेवा चालते .सुमारे ७०० गाई इथे होत्या . आश्रम अतिशय सुंदर असून मोठे आवार ,प्रशस्त परिसर आणि भरपूर झाडी आहे . 

आश्रमातील सुंदर शिवपूजा

मौनी बाबांच्या मागे लावलेला संदेश विशेष महत्त्वाचा !

इथे अप्रतिम असे चहा पोहे मिळाले . या ठिकाणी एक भगवे कपडे घातलेला तमिळ साधू भेटला . तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसाची परिक्रमा करताना आश्रम आवडल्यामुळे तो इथे राहिला होता . या संपूर्ण आश्रमात आणि परिसरात कोणालाही तमिळ भाषेचा गंध नव्हता . तसेच याला तमिळ सोडून अन्य कुठलीही भाषा येत नव्हती . त्यामुळे तो बिचारा सुकला होता . मी चेहऱ्यावरून हा मनुष्य तमिळ आहे हे ओळखले . आणि वणक्कम स्वामी असे म्हटल्याबरोबर त्याने आनंदाने उडीच मारली ! मला थोडेफार तमिळ येथे आहे हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला ! माझ्याशी किती बोलू आणि किती नाही असे त्याला झाले होते ! तो मौनी साधू आहे असा समज सर्वांनी करून घेतला होता ! कारण तो बोलणे टाळायचा . तिरुअण्णामलईचा हा साधू होता .

सदृत्ती स्वामी असे त्याचे नाव होते . याने आधी हा रामेश्वरम चा आहे असे मला सांगितले . परंतु याची भाषा रामेश्वरम सारखी वाटली नाही म्हणून मी पुन्हा एकदा विचारले . मग त्याने तिरुअण्णामलै चे नाव सांगितले .

आपल्याला देखील एक वाईट सवय असते . कोणी गावाचे नाव विचारले की आपण मूळ गावाचे नाव न सांगता जवळच्या मोठ्या गावाचे नाव सांगतो . आपल्याला वाटते की आपल्या मूळ गावाचं नाव कोणाला माहिती नसेल . परंतु ते नाव माहिती करून देण्याची संधी अशा रीतीने आपण गमावत असतो ! आजही आपण गावाचे नाव विचारल्यावर मूळ गावाचे नाव थेट सांगितले पाहिजे असे माझे मत आहे . आता देखील साधूला वाटले की रामेश्वरम सर्वांना माहिती असते . म्हणून त्याने रामेश्वरम सांगितले . परंतु प्रत्यक्षामध्ये या दोन गावात शेकडो किलोमीटर चे अंतर आहे . तसेही छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुअण्णामलई येथील अरुणाचलपती देवस्थानचा जीर्णोद्धार केलेला आहे हा इतिहास सर्वांना माहिती आहे . रमण महर्षी देखील याच गावचे होते त्यामुळे या नावानेच प्रसिद्ध आहेत . अरुणाचलपती देवस्थानच्या एका गोपुराला राजा गोपूर असे नाव दिलेले असून त्यातला राजा म्हणजे आपला सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी राजे आहेत ,ही हिंदू माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ! या साधूला मी हा इतिहास सांगितला . त्याला खूप आनंद वाटला . त्याने देखील मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या . तमिळनाडूमध्ये पाच तत्वांना वाहिलेली पाच मंदिर आहेत . भूमी , जल , श्वास , आकाश , अग्नी , अशी तत्वे अनुक्रमे तमिळ लोक मानतात . नीलम् , नीर , काट्र , आकायम् आणि अग्नि अशी या तत्त्वांची तमिळ नावे आहेत . या तत्त्वांची देवस्थाने अनुक्रमे खालील गावात आहेत . कांचीपुरम , तिरुवणैकावल ( तिरुचिरापल्ली जवळ ) , कालश्री ,चिदंबरम ,तिरुअण्णामलै . ही सर्व माहिती मला साधू देत होता . आणि माझ्या वहीमध्ये मी तमिळ मध्ये लिहीत होतो . त्यामुळे त्याला अत्यानंदाचे भरते आले . आधी त्याला वाटले मी माझ्या मातृभाषेत लिहितो आहे . परंतु तमिळ लेखन पाहिले आणि त्याने मला मिठीच मारली ! मला साधू म्हणू लागला की आता तू इथून जाऊ नकोस . आपण इथे राहुयात ! दोघे एकत्र परिक्रमा करू ! परंतु मी नम्रपणे त्याला नकार दिला . 

सदृत्तीस्वामीने दिलेली माहिती प्रस्तुत लेखकाने तोडक्या मोडक्या तमिळ भाषेत लिहून घेतली . दुर्दैवाने हाताचा नुकताच अस्थिभंग झालेला असल्यामुळे आणि तो पूर्ण भरून न आल्यामुळे अक्षर सुवाच्य नाही याची कृपया नोंद घ्यावी .तमिळ वगळता मात्र आकडे इत्यादी लिहिण्यासाठी मी जन्मापासून आजपर्यंत मातृभाषेचाच वापर करतो .अर्थात देवनागरी लिपी वापरतो . ती लिपी आपण जपली नाही तर अन्य कोणीही जपणार नाही . आपल्या आईला आपल्या शिवाय अन्य कोणीही सांभाळणार नाही .

सदृत्ती स्वामीं समवेत प्रस्तुत लेखक . 

तमिळ साधू तेजस्वी होता . तपस्वी होता . तरुण होता सात्विक होता आणि नावाप्रमाणे सदवृत्तीचा होता . आपल्या देशामध्ये अशा लोकांना भाषेची अडचण कधी येत नाही . कोणीही अतिशय प्रेमाने अशा लोकांचा प्रतिपाळ करते . वरील चित्रात मागे नर्मदा माता दिसते आहे पहा .  तिथून काठाने मार्ग नाही असे मला सर्वजण सांगत होते . परंतु मला तिथूनच जायचे आहे असे मी निक्षून सांगितले . आणि निघालो . तिथे मार्ग होता . प्रचंड काटे कुटे होते . परंतु एक पाऊल ठेवता येईल एवढा रस्ता सर्वत्र होता . माझ्या आधी गेलेल्या कानफाट्या गोसाव्याच्या पायाचे ठसे पाहत मी चालू लागलो . नर्मदा माता हातात हात धरून सोबत होतीच !

लेखांक पंचाहत्तर समाप्त (क्रमशः )

 

लेखांक ७६ : खलघाट आणि कठोऱ्याचा ग्यारहलिंगी आश्रम

कोsहम्

प्राचीन महावृक्ष . मागे खलघाटचा पूल दिसतो आहे

अशा वृक्षा खाली बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते . इथे सूक्ष्म रूपाने कोणी ना कोणी तपस्या करत आहे असा भास होतो . इथली स्पंदने वेगळी असतात . 

या भागात शिवलिंगे भरपूर सापडत होती . चांगली चांगली शिवलिंगे सापडायची . परंतु ती सोबत घेतली की पाठीवर ओझे व्हायचे . त्यामुळे मी ती पोटातल्या कप्प्यात ठेवायचो . आणि पुढे जो कुठला आश्रम येईल तिथे एखाद्या झाडाखाली किंवा देवळात ठेवून द्यायचो . जेणेकरून जाणारा येणारा एखादा भक्त भाविक ग्रामस्थ ते उचलेल आणि घरी घेऊन जाईल . कधी कधी कोणाच्यातरी हातात ते देऊन टाकायचो . देण्यातला आनंद फार मोठा आहे . आपण तो कधी घेतला नसेल तर एकदा घेऊन पहा ! जे सर्वोत्तम आहे ते देऊन टाकायचे ! सर्वोच्च प्रतीचा आनंद मिळालाच पाहिजे ! असो . सहस्त्रधारेचा आवाज तीन किलोमीटर पर्यंत ऐकू यायचा ! थंडीचे दिवस असतील आणि निरव शांतता असेल तर कधी कधी नऊ दहा किलोमीटर पर्यंत तो आवाज पोहोचायचा ! म्हणून तर नर्मदेला रेवा म्हणतात . तिचा रवा ऐकू येतो म्हणून ती रेवा . मी अजूनही तिच्या आवाजाच्या टप्प्यामध्ये होतो . हळूहळू समोर तीन पूल दिसू लागले . खलघाटचे हे पूल आहेत . मुंबई इंदोर राष्ट्रीय महामार्ग येथून जातो . या पुला पूर्वी खल बुजुर्ग नावाचे गाव आहे . इथे नम्मदुस नावाचे रिसॉर्ट लागते .रिसॉर्ट चा परिसर खूप मोठा आहे . मी अर्थातच बाहेरूनच मार्गक्रमणा केली . पुढे साटक नावाची नदी आडवी येते . नदीचे पात्र खूप मोठे आहे . ती पार करून साटकेश्वर महादेवाच्या मंदिरात गेलो . 

साटकेश्वर महादेव

सटकेश्वर महादेवाच्या शेजारील मारुती . मारुतीची ही सर्व रुपे समर्थ स्थापित मारुती सारखी दिसतात .

खलघाट चे पुल मोठे आहेत त्यामुळे लक्षात राहतात .

इथून इंदोर साधारण ९० - ९२ किलोमीटर आहे . पुलाच्या वर जायची गरज पडत नाही . खालूनच निघता येते . 

नर्मदा मातेमधील नावांचा आकार आता हळूहळू मोठा होऊ लागला होता . इथे पाणी खोल आणि पात्राची रुंदी जास्त असल्यामुळे नाव मजबूत आणि मोठी असणे आवश्यक होते . 

इथे नर्मदेच्या मध्यभागी एक दगडी स्तंभ आहे . याच्या आजूबाजूला वाळूचा बेट बाजार टापू तयार झाला आहे . खलघाटच्या पुलावरून पाहिल्यावर हा आकार भारताच्या नकाशासारखा दिसतो .अर्थातच परिक्रमावासीना हे दृश्य पाहायला मिळत नाही . परंतु वाचकांसाठी संग्रहित चित्र सोबत जोडत आहे

इथे काठावरून चालताना कठीण असे काही ओढे पार केल्यावर एक राम मंदिर लागले . मंदिरामध्ये स्थानिक ग्रामस्थ खूप सेवा करत होते . एक साधु महाराज तिथे राहत होते . म्हणजे त्यांचा वेश साधूसारखा होता . परंतु अजून ते पूर्णपणे साधू बनले नसावेत असे मला वाटले . कारण त्यांनी संपूर्ण दाढी आणि केस कलप लावून काळे केले होते ! साधूला हे सर्व करण्याची गरज नाही ! तसेच जटा देखील वाढलेल्या नव्हत्या. 

कलप लावलेला कुठलाही मनुष्य दिसला की मला भिडे गुरुजींचा तो श्लोक आठवतो .

केले जरी कलप लावून केस काळे ।

 तारुण्य त्यातुनी कधी तरी का उफाळे ॥

फसवून पूर्ण जगतास ,आणि स्वतःस ।

लाभेल का कधी कुणा गत यौवनांश ॥

असो .

त्यांच्याशी गप्पा मारल्यावर असे लक्षात आले की ते आयुष्यामध्ये थोडेसे दुःखी देखील होते .  किंवा मी असे म्हणेन की पूर्णपणे सुखी नव्हते . परंतु परिक्रमावासींची सेवा मात्र ते मनोभावे करत यात काही शंकाच नाही . इथे प्रजापती पिता पुत्र पुन्हा एकदा मला भेटले . मी चहा आणि पोहे खाऊन पुढे निघालो होतो . परंतु प्रजापती पिता-पुत्र आल्यावर त्यांनी मला थांबवून घेतले आणि आमच्या सोबत जेऊन पुढे जा असे सांगितले .दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी उत्तम असे जेवण बनवून आम्हाला जेवायला वाढले . या भागाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . 

खलघाट येथील राम जानकी मंदिर

सडक मार्गाने येणाऱ्या परिक्रमावसंना हे महाद्वार लागते . ( मी मात्र अतिशय कठीण गटारवजा असलेला ओढा ओलांडून आश्रमात चढून वर आलो . )

मंदिरातील हनुमान जी

इथून समोरच भारताचा तो आकार नर्मदा पात्रात उठलेला आहे . इथे एक स्तंभ उभा केलेला आहे

 हेच राम मंदिराचे महंत

मंदिराचे आवार मोठे आहे .बाबांना भेटायला भक्त मंडळी येत असतात . इथे सतत काहीतरी पूजापाठ चालू असते .
मी पोहोचलो तेव्हा सुद्धा एका कुटुंबाची काहीतरी पूजा चालली होती . त्या पूजेसाठी आलेल्या काही तरुणांनी माझे फोटो काढले . आणि माझ्याकडे फोन नाही कळल्यावर मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले . 

राम जानकी मंदिर खलघाट येथे प्रस्तुत लेखक .मागे दिसणारे भारताच्या आकाराचे बेट आणि स्तंभ .

हीच ती जागा जिथे फोटो काढले आहेत . इथे उभी असलेली सवत्स धेनू . 

मागे खलघाट चे मुंबई इंदोर महामार्ग पूल दिसत आहेत . 


मध्यंतरी महाराष्ट्र एसटी मंडळाची एक बस अपघात ग्रस्त झाली होती पहा , ती याच पुलावरून खाली पडली होती . 


मध्ये जो जाड खांब दिसतो आहे त्याच्याखाली दगडांचे एक वर्तुळ आहे , तिथे ती पडली होती . 


परिक्रमा वासींचे फोटो आणि परिक्रमावासीं सोबत फोटो काढण्याचा आनंद नर्मदा काठावर अनेक जण घेत असतात . त्याचा लाभ मला या लिखाणाला अधिक आकर्षक  व स्वीकारार्ह बनविण्यासाठी निश्चितपणे होतो आहे ! या फोटोत तुम्हाला माझे वजन बऱ्यापैकी कमी झालेले लक्षात येईल .


राजेश प्रजापती आणि तनय यांच्याकडे मोबाईल फोन होता . त्यामुळे त्याने देखील माझ्यासोबत सेल्फी काढून घेतला . तो अलीकडे परिक्रमा झाल्यावर मला मिळाला .

विशाखापट्टणम इथून परिक्रमेसाठी आलेले राजेश प्रजापती आणि तनय प्रजापती . सध्या राजेश दिल्लीला असतो . तनयचे वाराणसी येथे शिक्षण चालू आहे . प्रस्तुत लेखकाचा दंड साधू लोकांना का आवडायचा ते तुम्हाला या चित्रातला दंड पाहिल्यावर लक्षात येईल !

आश्रमातील महंतांनी जाताना आश्रमाचा शिक्का वहीत मारून दिला .

तपोभूमी प्राचीन श्रीराम मंदिर नर्मदा तट

महंत खल बुजुर्ग श्री श्री 1008 श्री बालक दास जी महाराज , अध्यक्ष , षट दर्शन रेवा मंडल खरगोन , मध्य प्रदेश

हा दिवस होता ९ मार्च २०२२ चा . परिक्रमेतील ६६ वा दिवस !रस्ता मार्गाने चालणारे परिक्रमावासी सुमारे दोन तास उशिरा येथे पोहोचले . निघताना सर्वजण मला सांगायचे की रस्त्याने अंतर कमी पडते . परंतु दर मुक्कामी हे सिद्ध व्हायचे की काठाने चालणारा लवकर पोहोचतो ! इथून पूल ओलांडल्याबरोबर आळंदी मधील वारकरी मंडळींकडून चालवला जाणारा एक आश्रम आहे . इथे मी थांबलो नाही . परंतु परिक्रमा झाल्यावर मध्यंतरी खलघाटचा पूल गाडीने ओलांडताना या आश्रमामध्ये आवर्जून थांबलो होतो . तेव्हा परिक्रमावासींचे दर्शन देखील झाले ! खूप आनंद वाटला होता ! त्या वेळचे फोटो टाकत आहे . हे फोटो २०२३ च्या मार्गशीर्ष महिन्यात काढलेले आहेत . 


अलीकडच्या काळात पुन्हा खलघाटच्या काठावर जाऊन नर्मदा तटाचे अवलोकन करताना प्रस्तुत लेखक (डावीकडील ). सोबत मित्र . मागे नर्मदा मैयाचे विस्तीर्ण पात्र .

याच काठावरून ९ मार्च२०२२ रोजी चालत गेलो होतो ! ३० नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेले चित्र !

खाली जोग महाराज आश्रम दिसतो आहे . हा फोटो पाहिल्यावर काठावरचा रस्ता कसा आहे त्याचा अंदाज येईल .

मैयाचे विस्तीर्ण पात्र !नर्मदे हर !

अथांग नर्मदा मैया

जोग महाराज आश्रमाचा घाट . इथून पुन्हा किनारा पकडला 

पुढे खल टाका किंवा टाका खल गाव लागते . इथे रामाचे मंदिर आणि शिवमंदिर आहे . एक छोटा आश्रम सुद्धा आहे . हे सर्व पाहत पुढे निघालो . 

खल टाक्याचा खडकाळ किनारा

पाणी चढत उतरत असल्यामुळे किनारा गाळाने भरलेला आहे . चालताना जपून चालावे लागते .

अशी मोठी झाडे दिसली की तिथे शक्यतो एखादा आश्रम असतोच

किनाऱ्याने चालत चालत चिंचली गाव गाठले . इथे एक खूपच खोल नाला आडवा आल्यामुळे नाईलाजास्तव व गावात जावे लागले . 

आडवा आलेला नाला पार करणे किती कठीण आहे पहा !


वाटेतील हनुमान जी

गावामध्ये उत्खननात जुन्या वस्तीचे अवशेष मिळाले होते . इथे देव नाला होता त्याचे दर्शन घेऊन गावातून पुन्हा एकदा नर्मदेचा काठ पकडला . कठीण अशा रस्त्याने काठाकाठाने चालताना डावीकडच्या झाडीमध्ये अचानक मंदिर दिसू लागले  .हे एक पुरातन शिवालय होतं . आणि याचं नाव मनकामनेश्वर असं होतं .इथे भंडारा सुरू होता त्यामुळे मांडव वगैरे घातलेला होता . गावकऱ्यांनी मोठ्या आदराने मला एका खोलीमध्ये नेऊन बसवले . आणि भोजन प्रसाद जागेवर आणून दिला . मंदिर अतिशय सुंदर होते . आजूबाजूला गर्द झाडी होती . परिसरातील नागरिकांची उत्सवामुळे गर्दी झालेली होती . या मंदिरातील शिवलिंग थेट ममलेश्वरासारखे किंवा अमलेश्वरासारखे होते . साक्षात प्रति रूपच ! 

मनकामनेश्वर मंदिरापर्यंत जाताना नर्मदा मातेच्या अगदी काठाने चालताना प्रचंड झाडी लागते . वरवर पाहता मार्ग नसेल असे वाटते . परंतु एका पावलाची पायवाट सर्वत्र आहे . अशा झाडीतून थोडे जपून चालावे इतकेच . मी जपून चालण्यापेक्षा नाम जपून चालायचो ! आणि कठीण टापू सहज पार होऊन जायचा !

श्री मनकामनेश्वराचे सुरेख मंदिर

मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे

श्री अमलेश्वराची प्रतिकृती असलेल्या श्री मनकामनेश्वराचे दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा लोकांचा विश्वास आहे .

या धर्मशाळेमध्ये बसवून भोजन प्रसाद दिला गेला 

इथून पुढे नर्मदा मैया अतिशय सुंदर असे एक वळण घेते . वळताना तिच्यामध्ये एक बेट तयार होते . या बेटावर परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत . परंतु इथे असलेले प्राचीन शिवालय प्रसिद्ध आहे . 

एखादी उभी रेष मारल्यासारखे हे बेट नर्मदेच्या उदरामध्ये निर्माण झालेले असून त्याच्या टोकावर बिल्वामृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . बाकी बेटावर घनदाट झाडी आहे .

मनकामनेश्वर मंदिरापासून ग्यारहलिंगी आश्रमा पर्यंत जाण्याचा किनारा मार्ग बऱ्यापैकी खडतर आहे हे नकाशा पाहिल्यावर लक्षात येईलच .

आपल्या अस्थि देऊन पृथ्वी वाचवणारे दधीची महामुनी इथे रहायचे . ही त्यांची तपस्थळी असून इथे त्यांची व त्यांच्या पत्नीची समाधी देखील आहे .

 

श्री बिल्वामृतेश्वर महादेव मंदीर

 दधीचि ऋषी पूजित श्री बिल्वामृतेश्वर महादेव

मंदिर घनघोर जंगलाच्या मधोमध आहे

कितीही मोठा पूर आला तरी मंदिर जलमग्न होत नाही

दधीचि ऋषींनी वज्र बनविण्यासाठी आपली हाडे याच बेटावर दान केली होती . अज्ञातवासाच्या काळात पांडव देखील या बेटावर राहिलेले आहेत . त्यामुळेच धर्माराजावरून समोरच्या गावाला धर्मपुरी नाव पडलेले आहे .या बेटावर दत्तात्रेय आणि नर्मदा माता यांची देखील मंदिरे आहेत . परिक्रमेदरम्यान या बेटावर जाता येत नसले तरी हे एक पवित्र तीर्थस्थान मानले जाते म्हणून त्याची अधिक माहिती दिली .असो .पुन्हा आपल्या काठावर येऊयात .

या भागामध्ये नर्मदेच्या काठावर दगड गोटे खूप सापडतात . त्यांच्यावरून चालताना पायाला खूप आराम मिळतो . विशेषतः प्रत्येक पाऊल वेगळ्या वेगळ्या भागातील गुळगुळीत टोकदार दगडांवर टेकवले की तळ पायांना चांगला ॲक्युप्रेशर मसाज होतो . अशा गुळगुळीत दगडांच्या साठ्याची चालताना पावले उत्सुकतेने वाट बघत असत . अशा भागातून पाच-दहा मिनिटे चालले तरी पायांचा दिवसभराचा थकवा निघून जायचा . 

अशा मध्यम आकाराच्या दगडांवरून चालायला खूप बरे वाटते

वरील दोन्ही छायाचित्रांमध्ये डावीकडील दगड गोटे पाहावेत स्वच्छ नर्मदा जल पहावे आणि उजव्या हाताचे बिल्वामृतेश्वराचे बेट पहावे .

 कठोरा गावाचा घाट

यानंतर कठोरा गावाचा छोटासा घाट लागला . गावाकडे न जाता तसाच सरळ गेलो . इथे दोन-तीन केवट चहा पीत बसले होते .त्यांनी मला छोट्या कागदी कपात गार झालेला चहा पाजला . आणि पुढे ग्यारहलिंगी नावाचे स्थान असून तिथे साधूंसाठी आश्रम असल्याचे मला सांगितले . जिथे नर्मदा माई डावीकडे वळत होती त्या ठिकाणी खोल पात्राच्या आत मध्ये ११ स्वयंभू शिवलिंगे आहेत त्यामुळे या स्थानाला ग्यारहलिंगी असे नाव पडले आहे असे मला त्यांनी सांगितले . इथे समोर धर्मपुरी नावाचे गाव होते . इथे अर्थात समोरच्या तटावर कुब्जा नावाची नदी नर्मदेला येऊन मिळत होती .हिलाच खुजनदी असे सुद्धा नाव असल्यामुळे अलीकडच्या काठावर खुजावा गाव होते . इथे दक्षिण तटावर दोन देवनाले नर्मदार्पण होत होते .या अकरा शिवलिंगांपैकी अकरावे लिंग ओंकारेश्वराचा मोठा भाऊ मानले जाई . त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र होते . समोरच्या तटावरून नावेने या बेटावर येणाऱ्या लोकांची सतत वर्दळ दिसायची . काठाकाठाने चालत मी ग्यारहलिंगी आश्रम शोधू लागलो . उंच एका टेकाडावर झेंडा दिसला म्हणून वर गेलो . डावीकडे एक जुनी पुराणी इमारत होती . उजवीकडे एक  बैठा आश्रम दिसला . दोन्हीकडून मला नर्मदे हर चा पुकारा झाला . बालकदास महाराज या नावाने दोन साधू दोन वेगळेवेगळे आश्रम येथे चालवीत होते . मी आधी जुन्या इमारतीमध्ये गेलो . 

साधु महाराज बसले होते ती आश्रमाची इमारत .

एक प्रचंड जटाभार वाढलेले साधू अंधाऱ्या खोलीमध्ये गांजा पीत बसले होते . इमारतीच्या भिंती मजबूत असल्या तरी छप्पर फाटके तुटके होते . त्यातून आत येणाऱ्या प्रकाश रेखा गांजाच्या धुराने अधिक ठळक होत होत्या . " नर्मदे हर ! भोले बाबा की प्रशादी पाओगे ? " साधूने करड्या आवाजात प्रश्न केला . भोले बाबाचा प्रसाद म्हणजे गांजा पिणे . " नही बाबा । हम नही पाते ।" मी नम्रपणे साधूला सांगितले . त्याच्या आजूबाजूला चार-पाच भगत मंडळी "प्रसाद भक्षण " करण्यासाठी बसली होती . त्यातल्या एकाला चहा बनवण्याचा आदेश साधूने दिला . थोडासा निरीच्छेनेच तो उठला आणि अंगणामध्ये चहा बनवायला गेला .

याच ठिकाणी साधू बाबांनी मला उपदेश केला .

 साधू बहुतेक बराच वेळ गांजा ओढत असावा . त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती . एका खोल भावावस्थेमध्ये जाऊन तो माझ्याशी बोलत होता . साधू जीवनामध्ये जो काही पक्का उपदेश त्याने आत्मसात केलेला आहे तेवढाच अशाप्रसंगी आठवतो . बाकी सर्व विसरायला होते . तो मला जीवनातील अतिशय मूलभूत अशी काही तत्वे फार चांगल्या भाषेत सांगू लागला .

" देख बेटा । तू नर्मदा माई की परिक्रमा कर रहा है । मतलब तुझे पता है ,जीवन मे क्या करना है । और क्या नही करना । फिर भी याद रख । दुनिया गई भाड मे । तेरे मरने के बाद कोई तेरा नही , तू किसी का नही । दुनिया से उतनाही लगाव रखना , जितना खाने में नमक होता है । दुनियादारी करेगा तो ये भी जिंदगी बेकार की मौत मरेगा । " भगतरामने हातात चहा आणून दिला .

 (कृत्रिम प्रज्ञेने तयार केलेले काल्पनिक चित्र )
साधू बोलताना त्याची नजर धुनीवर स्थिर होती . डोळे लालबुंद झाले होते . परंतु आवाजात जरब कायम होती . " तेरा आज का दिन आखरी दिन है । " साधूने असे म्हटल्यावर माझा चहाचा कप जागेवरच थांबला . "कल तू मरने वाला है । " मी आजूबाजूच्या भगत लोकांकडे पाहू लागलो . सर्वजण खदाखदा हसू लागले . साधू म्हणाला "फट गई ना xx ? " मी हातातला कप खाली ठेवून हात जोडून बसलो . "पिले पिले । चाय पिले । ऐसी चाय पी , की मानो जिंदगी की आखरी चाय पी रहा है । ऐसी जिंदगी जी , की मानो जिंदगी का आखरी दिन चल रहा हो ! " साधूने बोलता-बोलता मला आयुष्यातील अतिशय मोलाचा उपदेश देऊन टाकला ! आणि स्वतः त्या गांजाचा एक असा झुरका मारला की जणूकाही हा त्याच्या जीवनातील शेवटचा झुरका असावा ! आणि साधारण पाच ते सहा फूट लांब बसलेल्या माझ्या अंगावर त्याने जोरात धूर फुंकला . त्या धुराने एक क्षणभर मला पूर्णपणे व्यापले . आजूबाजूचे दृश्य अदृश्य झाले . "भागो बाबाजी । तुम्हारा काम हो गया । दादाजी ने फूक मारी । अब दुनिया तुम्हारी नही मारेगी । " एक सीनियर भगत गांजाच्या नशेत बरळला . मी साधूला नमस्कार करून त्या खोलीतून बाहेर आलो . समोरच्या आश्रमामध्ये गेलो . इथे एका झाडाखाली सर्व संसार थाटलेला होता . 

या चित्रात जुना आश्रम दिसतो आहे .मी इथेच पारावर झोपणार होतो पण एका भगतरामने सांगितले की समोरच्या आश्रमात कुत्रा आहे तिथे झोपावे . म्हणजे बिबट्याचे भय नाही .

एका झाडाखाली कट्टा बांधून तिथे इथल्या साधूने त्याचे सर्व देव बसविले होते आणि धुना देखील स्थापन केला होता . हे महाराज देखील नित्य भोले बाबाचा प्रसाद सेवन करायचे . यांनी इथे कमांडो नावाचा एक काळा पांढरा चपळ कुत्रा पाळला होता . तेवढा एकच प्राणी तिथे शुद्धीमध्ये होता ! बाकी सर्वच माणसे एका पेक्षा एक विचित्र वाटत होती . विशेषतः मी जिथे आसन लावले होते , त्या कट्ट्याच्या समोर एका झाडाखाली अजून एका तांत्रिकाने आसन लावले होते . चित्रपटांमध्ये कवटी आणि हाडे वगैरे घेऊन बसलेली भयावह तांत्रिक माणसे दाखवायची पद्धत आहे पहा . हा मनुष्य अगदी तसाच होता .काळा कुळकुळीत रंग , कुरळे लांब केस , मजबूत बांधा ,कमरेला काळे वस्त्र , हातात गळ्यात अनेक प्रकारच्या माळा , लाल भडक डोळे अशा अवतारातला हा तांत्रिक होता . त्याच्यासमोर त्याने मानवी कवटी ठेवली होती . हातामध्ये मांडीचे हाड ( जे लांबीला सर्वात जास्त असते ) घेऊन त्या कवटीवर ते आपटत हा मंत्र म्हणायचा . याने तिथे आल्यापासून मला त्रास द्यायला सुरुवात केली . मला म्हणायचा , " चेला , जाव , पानी लेके आओ । " आता कोणाला पाण्याला नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती आहे . त्यामुळे मी त्याला एकदा पाणी आणून दिले .नंतर याचे नखरेच सुरू झाले . मी त्या माणसाच्या प्रत्येक क्रियेचे निरीक्षण करत होतो . अतिशय तामसी प्रवृत्तीचा तो जीव होता . थोड्यावेळाने त्याला भेटायला गावातील गांजाडे आले . सगळे मिळून गांजा ओढत बसले .तेव्हा सुद्धा याने मला एक दोन कामे सांगितली . मी फारसे आढेवेढे न घेता ती केली देखील . परंतु याने मला चेला म्हणणे मला काही पटले नाही .सर्वच जण गांजा पीत असल्यामुळे कोणाला भुकेची जाणीव होत नव्हती . त्यात मला असे लक्षात आले की हा तांत्रिक त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन मटका खेळत होता . चला भेटायला आलेले गांजाडे शिष्य सुद्धा त्याच्याकडून आकडे घेत होते . कुठून इथे आलो असे मला झाले . परंतु परिक्रमेच्या नियमानुसार एकदा लावलेले आसन बदलता येत नाही . अशी देखील एखादी रात्र असू शकते इतकाच धडा नर्मदा मैया मला देत होती . नाही म्हणायला तिचे अतिशय सुंदर असे दर्शन मात्र समोर होत होते .समोरच्या बेटावरील महादेवाचे मंदिर पुसटसे दिसत होते . मला या माणसाची भीती वाटत नव्हती परंतु आत्यंतिक घृणा मात्र येऊ लागली होती . या माणसाच्या हिंदीवर सांगली कोल्हापूरकडच्या मराठीचा संस्कार वाटला ! म्हणून तो फार बोलायला लागल्यावर मी एक-दोन अस्सल कोल्हापुरी सुभाषिते कमांडो कुत्र्याला ऐकवली . तो मराठी असल्याचे लपवित होता . पण मी तो मराठी असल्याचे ओळखले आहे असे वाटल्यावर मात्र तो माझ्याशी बोलायचा बंद झाला . रात्री अकराच्या सुमाराला साधू महाराजांना आठवण झाली की मी उपाशी आहे . त्यांनी एक-दोन भगताना कामाला लावून आमटी पोळी करून मला खाऊ घातली . तिथले वातावरण अतिशय नकारात्मक असल्यामुळे इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . आपण रात्री मला जाग आली . तेव्हा माझ्यासमोर असलेल्या झाडापाशी बसून ती मानवी कवटी झाडामध्ये खोचून या तांत्रिकाची काहीतरी अघोरी साधना चालू झाली . या पूर्ण काळामध्ये माझे ऐकणारी एकमेव व्यक्ती तिथे होती ती म्हणजे कमांडो कुत्रा ! तो पूर्णवेळ माझ्या पाया पाशीच बसला होता .हा कुत्रा अथवा नर्मदा खंडातील भाषेत भैरव आश्चर्यकारक रित्या अतिशय स्वच्छ होता . घरी सांभाळलेला , आंघोळ घातला जाणारा , पेडिग्री खाणारा कुत्रा जितका स्वच्छ असतो तितका हा स्वच्छ होता . त्यामुळे रात्री तो माझ्या अंथरुणातच झोपला . आणि मी देखील त्याला झोपू दिला . त्याला सुद्धा खूप दिवसांनी एखादा शुद्धीवरचा चांगला माणूस मिळाल्यासारखे वाटत होते . या भागात फारसे परिक्रमा वासी मुक्कामाला येत नाहीत असे माझ्या लक्षात आले . कारण हे मैयाचे वळण आहे . आणि इथे पारंपारिक प्रशस्त रस्ता नाही . काटे कुटे यांनी भरलेला कठीण मार्ग आहे . 

या भागातील काठावरचा चालण्याचा मार्ग कसा आहे हे लक्षात यावे म्हणून काही फोटो सोबत जोडत आहे .

बाभळीची प्रचंड बेटे सर्वत्र माजलेली आहेत . याच्यातून मार्ग काढत पुढे चालावे लागते . 

किनाऱ्याचा मार्ग हा असा असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी या मार्गाने जात नाहीत . परंतु "सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता । " या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे काठाकाठाने मार्गक्रमणा सुरु ठेवली .

मी झोपलो होतो तिथून समोरचे बेट ,त्याच्या वरील बिल्वामृतेश्वर मंदिराकडे जाणारा घाटमार्ग असे सर्व दिसत होते .

मध्यप्रदेश काँग्रेसचे सर्वेसर्वा दिग्विजयसिंहजी त्यांच्या पायी परिक्रमे दरम्यान या आश्रमामध्ये आवर्जून येऊन गेल्याचे आता गुगल नकाशा पाहिल्यावर कळले .

उद्या सकाळी उठल्यावर तुला चहा आणि बालभोग करून देतो असे सांगून साधू झोपी गेला . मी रात्रभर विचारात पडलो . इथून कधी एकदा निघून जातो असे मला झाले होते . त्यामुळे सकाळी चहा बालभोग वगैरे ची वाट न बघता लवकर निघून जायचे मी ठरवले . मला पहाटे उठून मी सर्व गुपचूप आवरून घेतले . आणि उजाडायच्या आधीच अंधारातच धूम ठोकली ! पटापटा उतरून किनार्‍यापाशी आलो . आणि वेगाने पुढे पुढे पळू लागलो . इतक्यात माझ्या असे लक्षात आले की दोन खोल ओढे मला आडवे आलेले आहेत .मागचा पुढचा अधिक विचार न करता मी अंधारातच त्या ओढ्यामध्ये उतरून ते पार केले . छातीपर्यंत पाण्याने भिजून गेलो . या परिसरामध्ये पायवाट नावाचा प्रकार नव्हताच . झाडीमध्ये खाली वाकून घुसावे लागायचे . ग्यारहलिंगीच्या त्या आश्रमातून माझी सुटका झाली असे मला वाटले खरे . परंतु मी न सांगता निघून गेलेले त्या साधूच्या उशिरा लक्षात आलेले असेल . आणि त्याने माझ्या नावाने नक्की बोटे मोडलेली असणार याची प्रचितीच मला त्यादिवशी आली ! त्यादिवशी मला मैयाने आश्रमात देऊ केलेल्या अन्नाचा अव्हेर केल्याबद्दल लक्षात राहील अशी शिक्षा दिली !  मैया है वह । सब जानती है !

लेखांक ७७ : बुराड संगम ,देव संगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रयज्ञाख्य तीर्थ मोहीपुरा

कोsहम्

ग्यारहलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा . परंतु अशा रीतीने अंधारामध्ये बाहेर पडणे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . त्यामुळे त्याचे बसायचे ते सर्व फटके मला बसले ! वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले . अनेक कोल्हे मला आडवे गेले . मोठे घुबड पाहिले . अंधारात अज्ञात जनावरे पळण्याचे आवाज ऐकले . पाण्यातून दोन खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती ! त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली . अजूनही झाडी कमी झाली नव्हती .अंधुक दिसू लागले होते .  

ग्यारह लिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे . नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथून चाललात तरच चालण्यापूर्ती जागा मिळते अन्यथा चालता येत नाही . परंतु नर्मदेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्या पुरती तरी जागा मिळाली .

आपण वरून खाली चालत आहोत .

हेच ते दोन ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले . मला असे वेडे साहस करायची इच्छा त्यादिवशी का झाली माहिती नाही . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही .तरी कृपया अन्य परिक्रमावासिनी हे अनाठायी साहस करू नये अशी विनम्र प्रार्थना . मैया ला त्रास होतो .

हा संपूर्ण किनारा कसा आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून याचे अजून एक गुगल चित्र टाकत आहे . याच्यामध्ये शेती दिसत असली तरी शेतातून चालणे फारसे सुखावह नसते . त्यामुळे हातातील दंड मैय्यामध्ये बुडवत बुडवत चालायचे . खूप आनंद मिळतो . 

हळूहळू जसजसे उजाडू लागले तसतसे सभोवताली पसरलेले दृश्य पाहून तनमन हरखून गेले ! जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र केवळ हिरवळ च हिरवळ होती ! नर्मदेचे पाणी अतिशय शांत होते . शांतता सुद्धा शांत होण्यासाठी इथे येऊन काही काळ शांत बसत असावी ! त्यात मी भिजलेला असल्यामुळे अजूनच थंड पडलो होतो ! थंडगार वारा ! डोळ्यांना देखील थंडावा ! स्वर्गीय अनुभव होता ! असे वाटत होते इथेच राहावे ! भव्य दिव्य नर्मदा पात्र पाहत राहावे ! अचानक समोर एक भव्य दिव्य नदी आडवी आली ! ही नदी तीन वेगवेगळ्या शाखांद्वारे नर्मदेला मिळत होती ! बुराड नदी किंवा बोराणी नदी असे तिचे नाव होते . नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होते . पात्राच्या मधोमध उभा राहून आकंठ पाणी प्यायलो . प्रत्येक नदीच्या पाण्याची चव वेगळी असते हा निसर्गाचा किती मोठा चमत्कार आहे ! आणि त्या चवीतला वेगळेपणा आपल्या टिचभर जिभेला कळतो हा त्याहून मोठा चमत्कार आहे ! नदीचे पाणी मोठा त्रिभुज प्रदेश तयार करत नर्मदार्पण होत होते . इथे खूप सारी शिवलिंगे सापडत होती . नानाविध रंगांची नानाविध ढंगांची शिवलिंगे पाहून उचलण्याचा मोह व्हायचा . परंतु वजन होत असल्यामुळे नाद सोडून द्यायचो . त्यातल्या त्यात एखादे खूप चांगले शिवलिंग मिळालेच तर जुने ओबडधोबड शिवलिंग तिथे ठेवून नवीन घ्यायचो ! म्हणजे वजन तेवढेच राहायचे . ही नदी पार करायला मजा आली ! आधीच भिजलेला असल्यामुळे या नदीला पार करताना काही वाटले नाही . मध्ये खोल डोहामध्ये स्नान देखील केले . मैयाच्या काठाने चालताना अन्य नद्यांची भीती वाटायची बंद झाली होती ! त्या सर्व नद्या आपल्याच आहेत असे वाटायचे ! त्या आपल्याला काय करणार ! आई पेक्षा मावशी जास्त माया करते तसा अनुभव या नद्या द्यायच्या ! अतिशय प्रेमाने त्या परिक्रमावासींना पार करवितात . माझी अशी खात्री पटलेली आहे की या सर्व नद्या , नाले , ओढे यांना स्वतःचे अस्तित्व असते . स्वतःचे मत असते . कुणाला पार करावयाचे आणि कुणाला बुडवायचे हे ठरविण्याची शक्ती यांच्यामध्ये असते . आपण जेवढे त्यांना शरण जाल तेवढे ते आपल्यासाठी सुखकारक असतात . पंचमहाभूतांची परीक्षा घ्यायला जाऊ नये . आपली तेवढी योग्यता नाही . किंबहुना होणारे परिणाम भोगण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये नाही .  ही नदी किती सुंदर होती हे तुम्हाला google नकाशा पाहिल्यावर कळेल .

विस्तारपूर्वक नर्मदार्पण होणारी बुराड अथवा बुराणी नदी . घाटवाड्या आणि नन्दगाव यांच्यामध्ये ही नदी लागते .

धरणाच्या पाण्यामुळे या भागातील बरीचशी गावे डूबक्षेत्रात जातात . त्याच्या खाणाखुणा तुम्हाला सर्वत्र दिसतात . मोठे मोठे महावृक्ष वठलेले आहेत . त्यांची पांढरी फटक खोडे नजरेत भरतात . काठावरील जी घरे दरवर्षी पाण्याखाली जातात ती सोडून लोकांनी मागे घरे बांधलेली आहेत . त्यामुळे ही जुनी पडकी घरे भकास दिसतात . मी साधूचा चहा बालभोग नाकारून पुढे आल्यामुळे आज मला वाटेमध्ये कोणी चहाच काय पाणी सुद्धा विचारत नव्हते . अर्थात वाटेत माणसे दिसतच नव्हती . परंतु जेव्हा एखाद्या गावातून जायचो तेव्हा देखील काही विचारणा होत नव्हती . इथे मध्ये अचानक डाव्या हाताला एक अतिप्रचंड खोल खड्डा काढलेला दिसला . मोठे मोठे जेसीबी अखंड काम करत होते . इथून नर्मदा मातेचे पाणी वळविण्याचे काम सुरू आहे असे मला कळले . या प्रकल्पाला नागलवाडी जल उपसा प्रकल्प असे म्हणतात . हा प्रकार फारच भव्य आणि अजस्त्र होता . गंमत म्हणजे नर्मदेपेक्षा खोल खड्डा काढून देखील खाली पाणी फारसे नव्हते . इथे बहुतेक नर्मदापात्रामध्ये खडक असल्यामुळे ही जागा निवडली होती . 

नागलवाडी जल उपसा प्रकल्प

प्रकल्पाची भव्यता दर्शविणारी काही छायाचित्रे

इथे खाली जिथपर्यंत खोदकाम कराल तिथपर्यंत वाळूच वाळू सापडते . नर्मदेच्या बाजूला मात्र मोठा अखंड खडक आहे असे अभियंत्याने मला सांगितले .

आता प्रकल्प पूर्ण झाला असून त्यात पाणी भरल्याचे दिसते . मी चालताना मात्र प्रकल्पाचे काम जोरात सुरू होते .

वरील चित्रात दिसणारा नागलवाडी प्रकल्प ब्राह्मणगाव चा घाट नर्मदा सेवा आश्रम आणि राम मंदिर . ही सर्व स्थाने पुढे पाहूयात .

नंदगाव मागे पडल्यावर ब्राह्मणगावात आलो . काठाने चालता चालता दगडी घाट लागला . घाट सुंदर होता . गावात राम मंदिर आहे असे कळले . दर्शनासाठी म्हणून वर गेलो . 

ब्राम्हणगावच्या घाटावर मी चालत आलो तो रस्ता समोर सरळ रेषेत  आहे . 

पायऱ्या चढून वर गेले की ब्राह्मणगाव सुरू होते . विशेष म्हणजे गावात ब्राह्मणांची घरे नव्हती . राम मंदिरांचे पुजारी तेवढे ब्राह्मण होते . 

गावामध्ये एक नर्मदा परिक्रमावासी धर्मशाळा उभी करण्यात आलेली आहे . नदीच्या अगदी काठावर पत्र्याची शेड टाकून धर्मशाळा बांधलेली आहे . इथे मी गेलो . परंतु कोणीही मला बस देखील म्हणाले नाही चहा पाणी तर दूरची गोष्ट ! अर्थात यात या कोणाचा दोष नाही हे आपण जाणता ! मला आज उपाशी मारायचे मैय्यानेच ठरवले होते ! रात्री आसरा देणाऱ्या साधूचा , चहा पाण्याचा अव्हेर करून केलेला अपमान , ही नर्मदा खंडामध्ये साधी गोष्ट नाही !  थोडा वेळ या धर्म शाळेत बसलो . आणि राम मंदिरात जाऊन यावे असा विचार केला . 

हीच ती धर्मशाळा . ब्राम्हणगाव जिल्हा बडवानी

पत्र्याची शेड असली तरी धर्मशाळा अतिशय अत्याधुनिक आहे . स्वच्छ फरशी जागोजागी पंखे लावलेले आहेत . अशा सुविधा फार कमी ठिकाणी मिळतात .

परिक्रमावासी अशा पद्धतीने आसन लावतात . 

इथे फारसे अगत्य न दिसल्यामुळे मी राम मंदिरात गेलो .घरासारखेच मंदिर होते . किंवा बहुतेक मंदिरातच घर थाटले होते .रामरायाचे दर्शन घेऊन आलो आणि ओसरी मध्ये मी क्षणभर बसलो .  सकाळचे दहा वाजले असावेत . इतक्यात आतून एक माताराम आल्या आणि त्यांनी सांगितले बारा वाजल्या शिवाय भोजन मिळणार नाही .

ब्राम्हणगाव येथील रामाच्या उत्सव मूर्ती . दक्षिण भारतात कुंभकोणम जवळ स्वामीमलई नावाचे गाव आहे . इथे या सर्व ओतीव मूर्ती बनवल्या जातात .

आज रामराया देखील आपली बाजू घेत नाही असे लक्षात आल्यावर तिथून शांतपणे उठलो आणि पुढचा मार्ग पकडला . पोटामध्ये भुकेची जाणीव हळूहळू तीव्र होत होती परंतु सकाळी केलेला पराक्रम माहिती असल्यामुळे निरुपाय होता . नर्मदा तिचे अनुभव इतक्या खात्रीशीरपणे देत असते की आपल्याला चूक केल्याबरोबर शिक्षा काय मिळणार याची देखील खात्री असते . तसेच माझे झाले होते . मनातल्या मनात माझे द्वंद्व सुरू होते . एक मन म्हणत होते कशाला निघायची घाई केली ? तो तांत्रिक असे माझे काय बिघडवणार होता ? आणि दिसली मानवी कवटी तर काय फरक पडतो ? दुसरे मन सांगत होते , जिथे आपल्याला कोणी विचारत नाही , तिथे क्षणभर तरी कशाला थांबावे ! आणि चालावे लागले उपाशी पोटी एखाद्या दिवशी तर काय फरक पडतो ! रोज सुग्रास अन्न देतेच आहे ना मैया ! एखाद दिवस सुट्टी घेऊ दे की तिला ! असे विचार करत किनारा पकडून झपाझप चालू लागलो . विश्वनाथ खेडा , चैनपुरा गावे ओलांडत मारु की चिंचली गावाची हद्द गाठली . चिंचली गावातील राम मंदिरामध्ये देखील भोजन प्रसाद मिळणार नाही असे मला सांगण्यात आले . तुम्हाला असे वाटू शकते की सारखे भोजन भोजन काय चालू आहे . परंतु जेव्हा पोटामध्ये आग पडते तेव्हा बाकीचे काही सुचत नाही . त्यात चालून कष्ट झालेले असतात जे तुमची भूक अजून गहरी करतात  .इथे देव किंवा डेब नावाची नदी आडवी येते . हिचे पात्र फार मोठे असून पाण्याला प्रचंड गती आहे . पाण्यात शेवाळे देखील खूप आहे . त्यामुळे थोडेसे उलटे गावात चालत जावे लागते . तिथून भयाण अशा वाळवंटातून नदी पार करावी लागते . म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जंगल आहे . परंतु कितीही खोल खणले तरी वाळूच सापडते . त्यामुळे हजारो लाखो वर्षांपूर्वीची ही वाळू अवैध रितीने उत्खनन करून काढण्याचा मोठा व्यवसाय या भागात आहे . वाळू खणणाऱ्या लोकांनी इतके विचित्र ठिकाणी उत्खनन करून ठेवलेले आहे की बरेचदा चार-पाचशे मीटर चालल्यावर आपल्या लक्षात येते की आता रस्ता संपला आहे व पुन्हा  उलटे जावे लागणार आहे . परत उलटे येताना देखील तुम्हाला पहिला रस्ता सापडेल याची खात्री नसते . इतका भयंकर भुलभुलैय्या येथे निर्माण झालेला आहे .  हा परिसर कसा आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . 

हे सगळे वाळू अधिक जंगल असे क्षेत्र आहे .

या भागात वन्य जीव देखील भरपूर असून कोल्हे लांडगे साळींदर यांची मोठी संख्या आढळते . जपून चालावे लागते . वाळूचे मोठे मोठे उभे कडे कापलेले दिसतात . त्यामुळे ज्या भिंती तयार होतात तिथे वेडे राघू  आपल्या गुहा किंवा घरटी बनवतात . अशा सुमारे २०० , ३०० घरट्यांचा समूह एकेका ठिकाणी मी पाहिला . एकंदरीत इथले चालणे भीती प्रद वाटते . पायाखालची वाळू देखील कधीही सटकेल याचा नेम नसतो . 

या देव अथवा डेबनदीचे एक वैशिष्ट्य आहे . हिच्या काठावर जेवढी म्हणून गावे आहेत त्या प्रत्येक गावाच्या नावात डेब हा शब्द आहे . उदाहरणार्थ  मेहगाव डेब , सेमलदा डेब ,पिपल्या डेब , पिपरी देब , बिल्वा डेब इ . फार थोड्या नद्यांना असे भाग्य मिळते . इथून पुढे नलवाई  किंवा नलवाय गावात आलो . इथे देखील कोणीही पाणी सुद्धा विचारले नाही . अखेरीस किनारा पकडून पुन्हा चालू लागलो . इथे कपिला नावाची नदी आडवी आली . नदी खोल होती . पलीकडच्या काठावर एक नाव नांगरलेली होती . तिथे आंघोळ करणाऱ्या एका माणसाने माझ्या दिशेला जोरात नाव ढकलून दिली . मी देखील काठीने नाव ओढून घेतली . नंतर स्वतःच नावेत बसून काठी ने वल्हवत वल्हवत पलीकडचा किनारा गाठला . माझ्या अंगातले सगळे बळ निघून गेले होते . कसाबसा घाट चढलो .हे लोहारा नावाचे गाव होते . इथे एका साधूची धर्मशाळा आहे असे कळले . मोठ्या आशेने धर्म शाळेमध्ये गेलो . साधूने सांगितले की जेवणाची वेळ टळून गेली आहे . दुपारी बारा वाजता आल्यावरच भोजन मिळते . त्याने आसन लावायला सुद्धा नकार दिला . आता मात्र मला खरोखरच पश्चाताप होऊ लागला .जाऊन जाऊन जावे तरी कुठे असा प्रश्न पडला . अखेरीस इथेच रस्त्यावर आसन लावण्याचा निर्णय मी घेतला . इथे घाटावरच एका निवृत्त कर्नल चा बंगला होता . त्याच्या बाहेर एक मोठे झाड होते . त्याच्या सावलीत रस्त्यावर मी आसन लावले . दुपारचे सुमारे तीन वाजले होते . नर्मदा मातेची क्षमा मागण्यासाठी मी घाट उतरून खाली गेलो . तसेही संगमावर स्नान केलेले नव्हतेच . अतिशय निसरड्या अशा त्या तिरक्या घाटावर तीन डुबक्या मारून स्नान केले . आणि हात जोडून नर्मदा मातेची मनोमन क्षमा मागितली . तिला मी सांगितले हे पहा मैया सकाळपासून मी अखंड चालतोच आहे . सुमारे दहा तास झालेले आहेत . पोटात अन्नाचा कण नाही . डोक्यावर सूर्य आग ओकतो आहे . आता इथून पुढे जाण्याची क्षमता माझ्या मध्ये नाही . मला मनापासून क्षमा कर . त्या साधूला सांग की ह्या परिक्रमावासीला त्याच्यापासून काही अडचण नव्हती . परंतु त्याने बाळगलेला मांत्रिक आवडला नसल्यामुळे हा पुढे निघून गेला . पुन्हा असा प्रमाद माझ्या हातून घडणार नाही . माझे तोंड मैया मध्ये बुडवले आणि डोळ्यांनी पुन्हा हाच निरोप तिला सांगितला . बाहेर आलो . अंग पुसले . आणि आसनावरती जाऊन पाठ टेकली . मंद गार वारा सुटला होता . दुपार टळून संध्याकाळ होण्याची लक्षणे दिसू लागली होती . आता छान झोप काढावी असा विचार मी केला . तसेही सुमारे २५ - २७ किलोमीटर अंतर मी सलग तोडले होते . आता माझा डोळा लागणार इतक्यात एक म्हातारी माताराम आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला . "बुखार है क्या बाबाजी ? " "नही मैया । " " तो  फिर बाहेर क्यू सोये हो ?अंदर आश्रम मे जाओ ना । " " अरे वो आश्रम वाले महाराज ताला लगाके चले गये । "मी सांगितले . " कोई बात नही । शाम को भी यही पे भोजन करोगे ना ? " माता रामने मला विचारले . "मैया आज मैने भोजन नही किया । अब शाम का तो पता नही । मैया जाने । " माझ्या या उत्तराने म्हातारी ताडकन उभीच राहिली ! "लोहारा गाव मे परिक्रमावासी भूखा सोएगा ? " चिडून नेमाडी भाषेमध्ये तिने बहुतेक साधूला लाखोली वहायला सुरुवात केली . मी तिला म्हणालो "माताजी गलती मेरी है । मैने सुबह चाय बालभोग ठुकराया है । उसकी सजा तो  भुगतनी पडेगी ना । " म्हातारी उठून ताडताड निघून गेली . मला पुन्हा डोळा लागला . थोड्या वेळात काही लोकांची गडबड ऐकू आली म्हणून मी जागा झालो . समोर काही लोक पूजा मांडून बसले होते . नीट लक्षपूर्वक ऐकल्यावर मला लक्षात आले की हे लोक मराठीमध्ये बोलत आहेत ! एकीकडे पूजा चालू होती तर एकीकडे स्वयंपाक चालू होता . दाल भाटी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता . त्यांच्यासोबत ची लहान मुले खेळत खेळत माझ्या जवळ आली . माझ्याकडे पाहून त्यांना मौज वाटत होती . रस्त्याच्या कडेला शक्यतो भिकारी झोपतात . आणि भिकाऱ्यांशी बोलू नये असे घरी मुलांना शिकवलेले असते . त्यामुळे मुले माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखी करत होती . खेळता खेळता त्यांचा चेंडू माझ्या अंगावर पडला . मी त्या मुलांना म्हणालो तुमची नावे सांगितली तरच चेंडू मिळेल ! मुले धावतच आपल्या नातेवाईकांकडे गेली आणि त्यांना सांगू लागली अहो तो भिकारी मराठी मध्ये बोलतो आहे ! त्यांचा काहीच दोष नव्हता . मी इतक्या नद्या ओढे नाले चिखलातून ओलांडून आलो होतो की माझे कपडे प्रचंड मळले होते ! बरं वस्त्रांवरची माती , हीच नर्मदेची विभूती हा भाव ठेवून चालत असल्यामुळे समोरच्या माणसाचा गैरसमज होणे स्वाभाविक होते . आणि तसेही एखाद्या भिकाऱ्यांमध्ये आणि माझ्या मध्ये काय फरक होता ? तो देखील भूक लागली म्हणून जेवायलाच मागतो ना ? मी दुसरे काय करत होतो ? तरी देखील त्या कुटुंबाचा प्रमुख माझ्याकडे बोलण्यासाठी आले . नमस्कार चमत्कार झाला . हे डॉक्टर चौधरी नावाचे अंमळनेर इथले वैद्यकीय डॉक्टर होते . त्यांनी बडवानी मध्ये क्लिनिक चालू केले होते . कुठल्यातरी पूजेच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना घेऊन ते नर्मदे काठी आले होते . मी परिक्रमा करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या घरातील सगळे जण माझ्या भोवती गोळा झाले . यांच्या पत्नी जळगावच्या होत्या . सर्वांनाच मराठी बोलणारा परिक्रमा वासी भेटल्यामुळे आनंद झाला होता . डॉक्टर चौधरी मला म्हणाले , " नेमके आम्हाला यायला उशीर झाला . आम्ही दुपारपर्यंत पोहोचलो असतो तर आमच्या सोबतच तुम्हाला दाल बाटी खायला सांगितले असते . " मी केवळ हसलो आणि काहीच बोललो नाही . इतक्यात ती वृद्ध माताराम पदरा आड ताट झाकून घेऊन आली आणि तिने मला  गरमागरम चार पोळ्या आणि भाजी वाढली !  हे पाहिल्याबरोबर डॉक्टर साहेब अवाक् झाले ! " हे काय ?तुम्ही अजून जेवला नव्हतात? " त्यांनी आश्चर्याने विचारले . आणि मला प्रेमळ तंबीच दिली . की आता मला त्यांच्यासोबत दाल भाटी सुद्धा खावी लागेल ! मग काय विचारता ! तसेही चार पोळ्यांनी माझे पोट भरणार नव्हतेच ! सोबत भरपूर दाल भाटी खाल्ली ! चुर्मा खाल्ला ! मस्तपैकी आंब्याचे लोणचे ओरपले ! सर्वांनाच खूप आनंद झाला ! अशाप्रकारे मैयाने शिक्षा भोगायला लावून नंतर चांगले बक्षीसही दिले ! या परिसरातील छायाचित्रे आपल्या माहितीकरता जोडत आहे . म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभ राहील !

हाच तो उताराच निसरडा लोहारा घाट जिथे मी स्नान केले . समोर जो तट दिसतो आहे तिथूनच नावेने मी इकडे आलो . ज्या नावेने आलो ती नाव सुद्धा झाडीमध्ये दिसते आहे पहा . ही नाव इथेच नांगरलेली असते .डावीकडून येते आहे ती नर्मदामाता आहे उजवीकडून येणारी कपिला नदी आहे .

संगमाचे स्थान तसे रम्य आहे फक्त काठावर चिखल खूप आहे .

गुगल नकाशा मध्ये पाहिले असता संगम असा दिसतो . लोहारा घाट आणि कपिलेश्वर महादेवाचे मंदिर देखील दिसत आहे . निळा पत्रा दिसतो आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .


हीच ती परिक्रमावासी धर्मशाळा जिला कुलूप लावून व्यवस्थापक साधू निघून गेला .

त्यामुळे इथे या पारावर मी आसन लावणार होतो . परंतु तिथे भैरव समूह झोपलेला असल्यामुळे मी पुढे रस्त्यावर आसन लावले .

हाच तो काँक्रीटचा रस्ता जिथे मी आसन लावले . समोर धर्मशाळा दिसते आहे पहा .


अगदी याच नंदी मंडपाजवळ सावलीमध्ये मी आसन लावले .मागे काळे पांढरे दार दिसते आहे तो कर्नल साहेबांचा बंगला आहे .

कर्नल साहेबांच्या बंगल्यामध्ये एक आवळ्याचे झाड होते . त्याचा आवळा टप करून माझ्यासमोर पडला आणि मला आवळे खायची इच्छा झाली . तर जाताना डॉक्टर चौधरी यांनी न विचारता बिस्किटे आणि अर्धा पाऊण किलो आवळे मला सोबत दिले !पुढे बरेच दिवस या आवळ्यांनी माझी तहानभूक भागवली !

इथे पडल्या पडल्या नर्मदा कपिला संगमाचे असे सुरेख दर्शन होत होते . पाणी उतरल्यावर घेतलेले हे चित्र आहे . 

इथून थोडेसे पुढे गेल्यावर कपिलेश्वराचा घाट लागतो . ही भगव्या रंगाची नाव येथे कायम नांगरलेली असते . अशा नावा सरदार सरोवरामध्ये खूप आहेत .

कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या याच पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि पुढचा मार्ग चालायला सुरुवात केली .

इथून पुढे बरेच चढ उतार लागले .ओळीने काही टेकड्या आहेत . पहिल्या टेकडीवर बीमलेश्वराचे मंदिर आहे .

इथून नर्मदेचे खूप सुंदर दर्शन होते .

दुसऱ्या टेकडीवर सिद्धेश्वराचे स्थान आहे .

टेकडीवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले . इथून पुढे देखील काही लोकांनी जमिनी विकत घेऊन आश्रम बांधलेले आहेत .एक साईबाबा मंदिर आहे . पुढचे सर्व आश्रम खालूनच पहात पुढे निघून गेलो . परंतु वाचकांपैकी कोणी त्या मार्गाने गेले तर माहिती असावे म्हणून गुगल वर सापडलेले त्या स्थानाचे फोटो सोबत जोडत आहे .

श्री विमलेश्वर महादेव

महादेव मंदिरातून नर्मदेचे सुंदर दर्शन होते

मंदिराची टेकडी बऱ्यापैकी उंच आहे

मंदिर प्राचीन आहे . रम्य स्थान आहे .

सिद्धेश्वराचे स्थान देखील इथून जवळच आहे

अशी प्रत्येक स्थानाची काही ना काही आख्यायिका नर्मदे काठी आहेच आहे . त्यामुळे तीन वर्षे तीन महिने १३ दिवसाची परिक्रमा केली तरच सर्व पाहून होते . 

पारंपारिक साहित्य वापरून आधुनिक दिसणारे बांधकाम पुढे केलेले दिसते .

स्थापत्य विशारदांसाठी नर्मदा काठ हे नंदनवन आहे हे मी याचसाठी म्हणत आहे . तिथे अजूनही विविध प्रकारच्या वास्तु उभ्या करण्यास पुरेसा वाव आहे . प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्टने एक तरी वास्तू नर्मदे काठी सेवा म्हणून उभी करावी . खूप पुण्य मिळेल .आणि जगभरामध्ये नर्मदा खंडाचे नाव वास्तुवैविध्यामुळे प्रसिद्ध होईल . 

अजून एका टेकडीवरील साईबाबा मंदिर आणि आश्रम

मंदिराचा आकार थोडासा विचित्र आहे . परंतु कल्पक आहे . ओम श्री साई नाथाय नमः ।

या भागातील नर्मदा अतिशय भव्य दिव्य आणि शांत आहे .

पाण्याच्या मोटर्स चा आकार आणि उपसा क्षमता आता हळूहळू वाढत जाते आणि खांब लावून विद्युत तारा उचलून घेण्याचे प्रमाण वाढते . 

इथे अजूनच सावधपणे चालावे लागते . कारण आता थेट विजेचा झटका बसण्याची शक्यता असते ! मी बरेचदा खाली वाकून जायचो . परंतु माझी बिछान्याची गुंडाळी त्या वायरीं मध्ये नेमकी अडकायची . अजून थोडे खाली वाकावे तर गुडघे चिखलात आपटायचे ! तसाही इथून पुढे प्रचंड चिखल सुरू झाला ! मध्ये येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचे प्रमाण वाढू लागले . आणि सर्वच ओढे गुडघाभर चिखलाने भरलेले होते . धरणाचे पाणी उतरल्यामुळे असे झाले होते . त्यामुळे माझे सर्वांग चिखलाने भरून गेले ! खूप वेळा चिखलामध्ये रुतलो . घसरून आपटलो सुद्धा ! पाहणारे कोणीच नव्हते ! त्यामुळे बिनधास्त सर्व प्रकार चालू होता . धुण्याची देखील सोय नव्हती . कारण मैया मध्ये सुद्धा पाच ते दहा फूट चिखल झालेला होता . माझे मलाच हसू यायचे ! परंतु मी एक निरीक्षण केले . मैयाकाठचा चिखल पायाला लागला की पायाचे दुखणे कमी व्हायचे ! तो जणू काही औषधी चिखल होता ! दुखणाऱ्या पायांना मैयाने स्वतःच्या हाताने लावलेला लेपच जणू ! लेपा ! 
या भागातील ओढे नक्की कसे होते हे आपल्याला कळावे म्हणून त्या ओढ्यांचा गुगल नकाशा खाली जोडत आहे . हे सर्व ओढे कमरे एवढ्या पाण्यातून गुडघाभर चिखलातून पार केले . हळूहळू तुम्हाला जलस्रोत पाहिल्यावर तो किती धोकादायक आहे याचा अंदाज येऊ लागतो . आतला आवाज इथे तुम्हाला खूप मदत करतो . आणि तो निश्चितपणे आपला स्वतःचा नसतो ! त्याच्यावर देखील तिचीच सत्ता आहे !

हे सर्व ओढे काठाकाठाने चालत पार करायचे .अर्थात चातुर्मासामध्ये जेव्हा पाणी चढते तेव्हा हे सर्व जलमग्न झालेले असते . सुदैवाने मी पाणी उतरलेले असताना चालत होतो .

 नाहिली नामक नदी नर्मदेला येऊन मिळते तो संगम देखील असाच खूप मोठा आहे . या नदीला पार करणारी प्रत्येक व्यक्ती नाहीलीच पाहिजे असा तिचा नियम आहे ! त्यामुळे खोल पाण्यातून अंघोळ करतच बाहेर पडायचे ! ( परिक्रमेला जाण्याची त्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर पोहणे शिकून घ्यावे म्हणजे पाण्याची भीती जाते ! ) नद्या त्यांचे प्रवाह बदलत असतात . या नदीन बहुधा तिचा प्रवाह कधी बदलला नसावा . जगह से ना हिली इसलिये नाहिली ! असो . 

अखेर अतिशय सुंदर अशा मोहीपुरा आश्रमात येऊन पोहोचलो . सूर्य मावळतीला आलेलाच होता . गावातील तरुण आश्रमात केलेली सजावट उतरविण्याचे काम करत होते . सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले . परिक्रमा जवळपास संपलेली असल्यामुळे असा एखादा परिक्रमावासी जेव्हा येतो तेव्हा लोकांना खूप आनंद होतो असे मी अनुभवले .इथे ६२ वर्षे वय असलेले एक पती-पत्नी परिक्रमावासी अन्य परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी म्हणून थांबले होते . हा नितांत सुंदर आश्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांधलेला आहे असे मला सांगण्यात आले . हा आश्रम डूबक्षेत्रामध्ये बांधलेला असल्यामुळे दरवर्षी जलमग्न होतो . व पाणी उतरल्यावर पुन्हा त्याचा जिर्णोद्धार केला जातो . इथे असलेले सिद्धेश्वर महादेवाचे स्थान हे भार्गव ऋषींनी स्थापन केलेले आहे . अमृतानंद पुरी नामक एका यतींनी या स्थानाचा जीर्णोद्धार केला . पांडवांनी पूर्वी नर्मदे काठी एक सहस्र यज्ञ घातले होते . ते स्थान इथून दिसत होते .म्हणून या टोकाला सहस्रयज्ञाख्यतीर्थ असे नाव पडले . स्वामीजी स्वतः पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक होते . त्यामुळे ओघानेच या आश्रमामध्ये संघाच्या स्वयंसेवकांचा सदैव राबता राहिला आहे . आता देखील इथे अनेक तरुण काही ना काही काम स्वयंस्फूर्तीने करताना मी पाहिले . विशेष म्हणजे याच्यामध्ये लहान मुलांचा देखील मोठा सहभाग होता . सगळ्या वानरसेनेने मिळून तासाभरातच संपूर्ण आश्रम आवरून चकाचक केला .

 आश्रमाच्या याच खोलीमध्ये मुक्काम घडला . गावातील तरुणांचा आश्रमातील वावर लक्षात येण्याजोगा असतो .

आश्रमाचे स्वयंसेवक

आश्रमाच्या परिसरामध्ये सुंदर बगीचा दरवर्षी उभा केला जातो आणि दरवर्षी पुरामुळे ही सर्व शोभेची झाडे वठतात . मी आश्रमातील स्वयंसेवकांना टिकाऊ पाणथळ देशी वृक्षांची माहिती दिली . 

चातुर्मासामध्ये सिद्धेश्वराचे मंदिर आणि आश्रम अशा रीतीने जलमग्न असतो .

 या आश्रमामध्ये नर्मदेच्या काठावर एक अतिशय सुंदर अशी गोलाकार कुटीया उभी केली होती . मला या कुटीची रचना फारच आवडली . हिचे छप्पर देखील रंगीबेरंगी होते . गावातील एका तरुणाने मला कुटी आतून दाखवली . आणि त्या कुटी बाहेर उभे करून माझा एक फोटो त्याने काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो वाचकांसाठी सोबत जोडत आहे .

मोहीपुरा गावातील आश्रमामध्ये सुंदर अशा गोलाकार कुटी शेजारी उभा प्रस्तुत लेखक . मागे नर्मदा नाहीलि संगम दिसतो आहे .

हा आश्रम फारच रम्य होता . परंतु दुर्दैवाने येथे चातुर्मास करता येत नाही , कारण हा आश्रम चातुर्मासामध्ये  जलमग्न असतो .

चातुर्मासामध्ये हाच आश्रम अशा रीतीने संपूर्ण पाण्याने वेढला जातो . सरदार सरोवराची उंची वाढवल्यावर हा आश्रम बुडणे सुरू झाले . कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है ।

या भागातील अनेक पुरातन वृक्ष वठलेले आहेत आणि जुने वाडे देखील ढासळून ओस पडलेले आहेत . गावांमध्ये एक राम मंदिर आहे . द्वारके नंतर तशी हुबेहूब मूर्ती थेट याच गावांमध्ये आहे . त्यामुळे द्वारकाधीशाची ही मूर्ती प्रसिद्ध आहे . 

त्या मातारामने अतिशय सुंदर स्वयंपाक करून मला जेवायला वाढले . पोटभर जेवून बाहेर चालायला आलो .

इथे रात्री गावातील तरुणांचे प्लास्टिक बॉल क्रिकेटचे सामने आश्रमाला लागूनच चालले होते ते पाहत बसलो आणि समालोचकाचे विनोदी शैलीतील समालोचन ऐकून हसून हसून अक्षरशः पोट दुखायला लागले ! आपल्या समालोचनावर एक परिक्रमावासी हसून हसून लोळतो आहे हे पाहिल्यावर त्याने विनोदाची पातळी अजूनच वाढवली आणि संपूर्ण परिसर हास्यमग्न करून टाकला !

क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी समालोचन होते की समालोचनाची मजा वाढवण्यासाठी बाजूला क्रिकेटचे सामने ठेवले होते हेच कळत नव्हते ! कारण सर्वांचे लक्ष त्या स्टँड अप कॉमेडी कडेच अधिक होते !

माझ्यासोबत गावातील एक दोन मुले सामने बघत बसली होती . गावातील मुले क्रिकेट मात्र चांगले खेळत होती . या गावात सर्व मंडलोई आडनावाचे लोक होते . त्यामुळे फलंदाज पण मंडलोई , गोलंदाज पण मंडलोई आणि क्षेत्ररक्षक देखील मंडलोई असायचा ! तसा क्रिकेट या खेळाचा माझा फारसा संबंध नाही . मुळात मी स्वतः अतिशय टुकार दर्जाचे क्रिकेट खेळतो . हा खेळ मला कधीच फारसा आवडला नाही .मला कधीच भरवशाचा फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून वापरले गेले नाही . परंतु काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका छोट्याशा उद्योगामुळे काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी माझा संबंध आला होता इतकेच . आम्ही काही मित्रांनी मिळून एक यंत्र बनवले होते , ज्याच्यावर क्रिकेटचा सराव करता याचा . बघता बघता या यंत्राची कीर्ती सर्व प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये पसरली आणि त्या सर्वांनी ही यंत्रे आमच्याकडून विकत घेतली . सचिन ,द्रविड , गांगुली , सेहवाग , राहणे , भज्जी ,  इरफान पठाण ,युसुफ पठाण , कुंबळे वगैरे सर्वांनी आमची यंत्र वापरली होती .सहज बोलता बोलता मी ही माहिती माझ्यासोबत बसलेल्या त्या दोन मुलांपुढे बोलून गेलो . आणि ते धावतच स्टेजवर गेले . समालोचक लगेच तिथून माइक वर ओरडू ओरडू सांगू लागला ! आज आपले सौभाग्य आहे की तेंडुलकरचे मित्र आपले सामने पाहायला आलेले आहेत ! वगैरे वगैरे विनोदी शैलीतल्या लोणकढी थापा त्याने सुरू केल्या ! हे ऐकल्याबरोबर मी जी धूम ठोकली ते आश्रमाच्या खोलीत जाऊन आतून कडीच लावून घेतली . आणि झोपून टाकले ! रात्रभर बक्षीस समारंभासाठी कोण जागणार !  इथे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला की स्वतःविषयी मौन राहणे परिक्रमेमध्ये किती आवश्यक आहे व का आवश्यक आहे !

आता विषय निघालाच आहे म्हणून वाचकांच्या माहिती करता याबाबतची काही निवडक चित्रे सोबत देत आहे . त्यातील काही खेळाडूंना आपण देखील ओळखत असाल . 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या समवेत बांद्रयातील त्यांच्या घराच्या मागील अंगणात प्रस्तुत लेखक . 

अर्जुन तेंडुलकर यांच्यासमवेत त्याच 'बॅकयार्ड' मध्ये पुन्हा कधीतरी

हरभजनसिंह सह त्याच्या जलंधर मधील अकादमीमध्ये

पारस म्हाम्ब्रे यांच्यासह विदर्भ क्रिकेट अकादमी मध्ये

सर चंदू बोर्डे यांच्या समवेत चंदू बोर्डे पॅव्हेलियन समोर आमच्या यंत्रासह

क्रिकेटर विनू मंकड यांचे नातू आणि भारताकडून २० डेविस कप खेळलेल्या हर्ष मंकड यांच्यासमवेत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजीओ अली इराणी यांचे समवेत

क्रिकेट प्रमाणेच टेनिस सरावाचे यंत्र देखील आम्ही बनवायचो . भारताचा महान खेळाडू लिएंडर पेस समवेत

भारतातील क्रमांक एकचा टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि क्रमांक दोन बालाजी यांच्या समवेत कोवई मध्ये

राजकीय फटकेबाजी करणाऱ्या राज ठाकरे यांना टेनिस कोर्ट वरील फटकेबाजी बद्दल सांगताना

तेव्हा राज ठाकरे यांनी नुकतेच टेनिस शिकायला सुरुवात केली होती

अमित ठाकरे देखील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे गिरवीत होते

शर्मिलाताई ठाकरे यांचा सराव घेताना प्रस्तुत लेखक

या घटनेच्या बातम्या देखील तत्कालीन मीडियावर गाजल्या होत्या

राज ठाकरे यांच्या समवेत छ. शिवाजी पार्क मैदानावर प्रस्तुत लेखक

सचिन तेंडुलकर यांनी स्वाक्षरी करण्यापूर्वीचे चित्र

प्रस्तुत लेखकाने महाविद्यालयीन जीवनात काढलेली ही चित्रे संबंधित खेळाडू कडून स्वाक्षरी करून घेतलेली आहेत . कोठे गैरवापर होऊ नये म्हणून स्वाक्षरी चा भाग काढलेला आहे .

अकरावी मध्ये असताना रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणे ऐवजी टीप कागदावर काढलेले सचिनचे चित्र देखील त्याला आवडले आणि त्याच कागदाच्या मागे त्याने स्वाक्षरी दिली .

चित्रापर्यंत ठीक आहे परंतु असे व्यावसायिक खेळाडू हे तरुणांचे आदर्श असू शकत नाहीत किंबहुना असू नयेत.

आपले म्हणजे तरूणांचे खरे आदर्श असेच हवेत !

महाविद्यालयीन जीवनातील प्रस्तुत लेखकाचे एक पेन स्केच !  असो .

हे सर्व सांगण्याचे कारण इतकेच आहे की  कोणाला असे वाटू नये की आयुष्यात काहीच न जमलेली माणसे नर्मदा परिक्रमा करतात . याउलट अनेक परिक्रमा वासी पाहिल्यावर मला असे जाणवले की आयुष्यात सर्व काही करून झाल्यावर अजून काहीतरी अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय करण्याची , अनुभवण्याची उत्कट इच्छा असलेले लोकच नर्मदा परिक्रमा करतात . मी शक्यतो या सर्व गोष्टींविषयी फारशी वाच्यता आजवर कुठे केलेली नव्हती . कारण ती करण्यासाठी लागणारी समाज माध्यमे वापरणे मी २००६ सालापासूनच , VIS अर्थात virtual identity suicide करून बंद केलेले आहे . परंतु हा ब्लॉग मोठ्या प्रमाणात तरुण देखील वाचत आहेत . त्यांच्यामध्ये परिक्रमेविषयी आणि परिक्रमावासीं विषयी  नकारात्मक संदेश जाऊ नये म्हणून मुद्दाम वरील फोटो काहीशा अनिच्छेने सोबत जोडलेले आहेत ,याची सूज्ञ वाचकांनी कृपया नोंद घ्यावी . माझ्याशी वैयक्तिक परिचय नसलेले अनेक वाचक मनोमन असा विचार करू शकतात की आयुष्यात काही नकारात्मकता आली म्हणून या तरुणाने परिक्रमा उचलली की काय ? तर तसे काही नसून आयुष्यात देवदयेने आलेली सकारात्मकता योग्य प्रकारे वापरली जावी म्हणून ही परिक्रमा आहे ! 

आपली सर्व विहित कर्मे यथाशक्ती ,यथामती , यथायोग्य आटोपून घ्यावीत आणि मग गुर्वाज्ञेने यथावकाश , सावकाश परिक्रमा उचलावी हे उत्तम ! 

नर्मदे हर !

लेखांक सत्त्याहत्तर समाप्त ( क्रमशः )

लेखांक ७८ : दतवाडा चा स्वामी प्रबुद्धानंद भारती स्थापित रम्य असा रम्या परिक्रमावासी निवास आश्रम

कोsहम्

त्यादिवशी मी पहाटे लवकर उठून आन्हीके आटोपून सिद्धेश्वरा समोर बसून शंकराची स्तवने म्हटली . परिक्रमावासी दांपत्यासोबत महादेवांचे आरती केली . माझी पूजा अर्चा आटोपून घेतली . 

    वहीमध्ये आश्रमाचा शिक्का घेतला .

गावातील एक मनुष्य आम्हा तिघांना चहा पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी आला होता . त्याच्यासोबत त्याचे घरी चहा पिण्यासाठी तिघेही गेलो . याने सुंदर असा चहा पाजला आणि शेतातल्या भरपूर शेंगा सोबत खायला दिल्या . गावातील राम मंदिराचे दर्शन घेतले . तिथून निघालो आणि थेट मैयाचा किनारा गाठला . थोडेसे अंतर चाललो आणि एका कोळ्यापाशी येऊन थांबलो . धरणातील पाणी कमी जास्त होत असल्यामुळे येणारी भरती ओहोटी याचा अभ्यास करून याने अशा पद्धतीने जाळे लावले होते की रात्रभर भरपूर मासे त्याच्या जाळ्यात सापडले होते . दोघे नवरा बायको मासे गोळा करायचे काम करत होते . त्यांचे ते कर्म थोडावेळ पाहत राहिलो . तडफडणारे मासे इकडे तिकडे उड्या मारत होते . क्षणभर वाटले या माशांना उचलून परत पाण्यात सोडावे . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . नर्मदेच्या काठावर जे काही सुरू आहे त्यात ढवळाढवळ करण्याचे काम परिक्रमा वासी ने जाणीवपूर्वक टाळायचे असते . हे सर्व मी पाहत असताना एक छोटासा मासा माझ्या पायावर येऊन पडला . मी त्याला उचलले आणि माझ्या मनातला भाव कोळ्याने ओळखला . मला म्हणाला "फेक दो बाबाजी मैया मे । " मी आनंदाने माशाला नर्मदा मातेमध्ये फेकले ! थोडेफार त्याच्या या व्यवसायाचे गणित समजून घेतले आणि पुढे निघालो . साधारण एक किलोमीटर चाललो असेन . इतक्यात डावीकडे काहीतरी आहे असे मला जाणवले म्हणून खडकाळ किनारा सोडून पुढे वर चढलो . समोर एक आश्रम दिसत होता . नर्मदा मातेकडे तोंड करून बांधलेल्या सुंदर ध्यान कुटी होत्या . आश्रमाला कुंपण होते आणि दार होते . परंतु दाराचे कुलूप उघडे आहे असे मला दिसले म्हणून मी ते उघडून आत गेलो . राधा नावाची एक माताराम बागेत झाडलोट करत होती . तिला बहुतेक माझे मागून येणे अपेक्षित नसावे . ती जोरात मला म्हणाली " कौन चाहिये बाबाजी ? " मी तिला विचारले की या आश्रमाचे व्यवस्थापक कोण आहेत ? तिने सांगितले की चेन्नई वाले स्वामीजी आहेत . आता तमिळ बोलायला मिळणार या आनंदामध्ये मी असतानाच आतून पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक मनुष्य तिथे आला . "वणक्कम अय्या " मी म्हणालो . " वणक्कम वणक्कम . यार निंगे ? यन्न वेणुम ?  " अर्थात कोण तुम्ही ? काय पाहिजे तुम्हाला ? असे मला त्या व्यक्तीने विचारले . हे या आश्रमाचे व्यवस्थापक होते . मी म्हणालो '"नानू ओरू परिक्रमावासी . स्वामीजी ह्येंगे इर्कारे ? स्वामीयै पार्कलाम् " अर्थात मी एक परिक्रमा वासी आहे . स्वामीजी कुठे आहेत ? मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे . व्यवस्थापक राधाशी नेमाडी भाषेमध्ये बोलू लागले . त्यांनी तिला विचारले की हा माणूस आत मध्ये कसा काय आला ? राधा म्हणाली मी पण तोच विचार करते आहे . दार बंद असताना हा कसा काय आत आला ? ती नेमाडी भाषेमध्ये सांगत होती की मी तर या बाबाला बघून घाबरलेच ! अर्थात तिचा त्यात काही दोष नव्हता . गेले दोन दिवस प्रचंड चिखलातून चालल्यामुळे मळलेले माझे कपडे मी धुतलेच नव्हते ! त्यामुळे माझा वेश एखाद्या भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हता !  माझ्या लक्षात आले की आता आपल्याला बहुतेक आल्या पावली त्याच दरवाजाने बाहेर काढले जाणार ! म्हणून मी शेवटचे अस्त्र काढले . आङ्ग्लास्त्र !  आणि म्हणालो , "sir, आय एम रियली व्हेरी सॉरी . आय वॉज नॉट सपोजड टू एंटर फ्रॉम बॅक गेट . But I saw the gate open so I came inside." अर्थात क्षमा करा . मी मागच्या दाराने आत मध्ये यायला नको पाहिजे होते . परंतु दार उघडे दिसले म्हणून मी आलो " No no. Please don't miss understand. I am just thinking who opened the lock if Radha didn't? Because I had myself locked it . Anyway welcome to ashram!" व्यवस्थापक म्हणाले छे छे तसे काही नाही . फक्त दरवाजाचे कुलूप राधाने नाही उघडले तर मग उघडले कुणी हा विचार मी करतो आहे . कारण मी स्वतः कुलूप लावले होते .

माझे हे वाले अस्त्र बरोबर बसले असे मला वाटले! परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत या कुलपाचा उलगडा काही झाला नाही . इतक्यात तिथे मल्ली नावाचा एक मनुष्य आला आणि कानडी मध्ये व्यवस्थापकांशी बोलू लागला . त्याने कानडी मध्ये त्यांना सांगितले की सर्व गाड्या धुवून झाल्या आहेत . व्यवस्थापक देखील अस्खलित कानडी मध्ये त्याला सांगू लागले की आता एक काम कर . या बाबाजींना त्यांची खोली दाखव . त्यांचे सामान न्यायला मदत कर . त्यांना कानडी मध्ये बोलताना ऐकून मी कानडी मध्ये विचारले " नीवु कन्नडीगारे ? "  " इल्ला . नानु मऱ्हाट्टा " "कुठलं गाव ? " "पुणे" "अरे वा ! मी पण पुण्याचाच आहे ! " असे मी म्हणालो मात्र आणि दोघेही हसायला लागलो ! कारण इतका वेळ आम्ही दोघांनी देखील एकमेकांना आपल्या मातृभाषेचा पत्ता लागू दिला नव्हता !  हा आश्रम स्वामी प्रबुद्धानंद भारती नामक एका जन्माने तमिळ असलेल्या ग्लोबल संन्यासी महाराजांचा होता . ग्लोबल म्हणायचे कारण असे की स्वामीजी कधी स्वतःला एका प्रांताशी , एका भाषेशी , एका विचारधारेशी ,एका पक्षाशी , एका राष्ट्राशी , एका पंथाशी , नव्हे नव्हे एका धर्माशी देखील बांधून ठेवत नसत .आणि हे व्यवस्थापक महोदय होते श्री सुहास सुरडी . एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे सुहासजी स्वामीजींचे निस्सीम शिष्य होते . यांना भारतीय आणि विदेशी अशा अनेक भाषा येत होत्या . नुसत्या येत नव्हत्या तर अतिशय उत्तम येत होत्या ! माझा भाषिक अभिमान गळून पडण्यासाठीच नर्मदा मातेने यांची माझी भेट घडविली असा माझा ठाम विश्वास होता ! मला येणारी प्रत्येक भाषा तर यांना येतच होती . परंतु त्या शिवाय देखील अनेक भाषा यांना अतिशय सुलभतेने बोलता येत होत्या . हे ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेचा लहेजा उचलून घ्यायचे घ्यायचे . त्यामुळे समोरच्या माणसाला त्यांची मातृभाषा ओळखता येणे खरंच खूप कठीण होते . मी सुहास जी म्हणाल्यावर त्यांनी मला सांगितले की फक्त सुहास म्हण . सुहास यांनी मला सांगितले की वरती आसन लावून स्वच्छ आंघोळ करून स्वामीं च्या दर्शनाला मी खाली यावे .परंतु मला क्षणभर स्वामींचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचे होते . हे आंघोळ प्रकरण नवीन कुठून आले असा विचार मी करू लागलो ! कदाचित माझे मळलेले रूप पाहून यांनी मला हे सांगितले असावे असा विचार मी केला .ठीक आहे . जिथे जो नियम आहे तिथे तो पाळलाच पाहिजे असा विचार करून आता सामान घेऊन मी वरच्या मजल्यावर असलेल्या परिक्रमावासी निवासस्थानाकडे कुच करणार इतक्यात स्वामींचा धीर गंभीर आवाज घुमला . "यार पा ? " कोण आहे रे ? स्वामीजींनी विचारल्या बरोबर सुहासने तमिळमध्ये उत्तर दिले की स्वामीजी एक परिक्रमावासी आलेला आहे . तुमचे दर्शन घ्यायची इच्छा आहे . पाठव त्याला स्वामींनी तमिळमध्येच सांगितले . आणि मी आनंदाने धावतच आश्रमाच्या आत मध्ये आपल्या कुटी बाहेर वर्तमानपत्र वाचत आराम खुर्ची मध्ये बसलेल्या स्वामीजींकडे गेलो . धिप्पाड देहयष्टी असलेले तेजस्वी स्वामीजी खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत होते .  मी गेल्या गेल्या स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला . ओम नमो नारायणाय ! आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहिलो . त्यांनी मला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळले आणि म्हणाले , " why are your clothes so dirty young man? " अर्थात तुझे कपडे इतके मळलेले का आहेत ?

" They are not dirty Swami ji. They are full of holy mud from Narmada basin" मी म्हणालो की ते कपडे मळलेले नाहीत . नर्मदा खंडातल्या पवित्र धुळीने माखलेले आहेत . माझे हे उत्तर स्वामींना फार आवडले ! आणि त्यांनी जोरात टाळी वाजवली ! " दॅटस् द आन्सर ! "

हरी ? त्यांनी हरी नावाच्या शिष्याला हाक मारल्या बरोबर आतून एक तरुण तेजस्वी मुलगा पळत बाहेर आला . प्लीज गेट द फाईन क्लोथ फॉर यंग मॅन फ्रॉम माय कबर्ड .

माझ्या कपाटातून याच्यासाठी तलम असे वस्त्र घेऊन ये . 

हरी धावतच आतून सुंदर असे फिकट पिवळ्या रंगाचे दक्षिण भारतीय करवत काठी धोतर आणि उपरणे घेऊन आला .  याचे कापड खूप चांगल्या दर्जाचे होते . स्वामिनी माझ्या हातात ती वस्त्रे दिली आणि सांगितले की स्वच्छ आंघोळ करून ही वस्त्रे घालून पुन्हा मला भेटायला ये . वस्त्र हातामध्ये पडल्याबरोबर मी ओळखले की हे रामराज मिलचे कापड आहे . "रामराज अल्वा ? " मी म्हणालो . आणि स्वामीजी आश्चर्यचकित झाले ! हाऊ डू यु नो दॅट दिस इज रामराज क्लॉथ ? तुला कसे काय कळले की हे रामराज मिलचे कापड आहे ? मी तमिळमध्ये उत्तर दिले . इतके तलम कापड फक्त रामराजच बनवू जाणे ! स्वामीजी हसायला लागले ! त्यांनी शेवटपर्यंत मला ते तमिळ आहेत असे जाणवू दिले नाही . परंतु मी अधून मधून तमिळमध्ये बोलून त्यांना मनोमन खुश करून टाकायचो . त्या पहिल्याच भेटीमध्ये हे स्वामीजी मला आवडले ! का आवडले कसे आवडले हे प्रश्न निरर्थक आहेत . प्रत्यक्षात पाहिले तर आमचे अनेक विषयांमध्ये मतभेद देखील होते . परंतु मला स्वामीजी आवडले आणि स्वामीजींना देखील मी आवडलो असणार हे जाणवण्यासारखे बरेच काही पुढे घडले . 

चित्राखाली लिहिलेल्या ओळींचा स्वैर अनुवाद असा

साधूचे ध्येय देवाची किंवा धर्माची सेवा करणे हे नाही . त्याचे एकमेव ध्येय आहे मोक्षप्राप्ती .मोक्षप्राप्ती हे दैवी एकरूपतेचे प्रकटीकरण आहे . - सद्गुरु श्री श्री प्रबुद्धानंद भारती स्वामीजी

मी स्वामीजींना म्हणालो की मी आत्ता सकाळीच चालायला सुरुवात केली आहे . एक किलोमीटर सुद्धा चाललेलो नाही . आणि आज मला पुढच्या मुक्कामी पोहोचावे लागेल . त्यामुळे मी स्नान करून आपले दर्शन घेऊन पुढे निघेन . स्वामीजी म्हणाले , असे काही ठरवायची पद्धत नर्मदा परिक्रमेमध्ये असते का ? रोज अमुक अमुक किलोमीटर चालले पाहिजे असे कोणी सांगितले आहे ? आम्ही तुला आवडलो नाही का ? मला माझी चूक लक्षात आली . आणि मी हात जोडून उभा राहिलो . स्वामीजी म्हणाले हे पहा आम्ही संन्यासी आहोत . सतत भ्रमण करत असतो . उद्या मी बंगलोरला जाणार आहे . त्यामुळे आजचा दिवस जर तू राहिलास आणि थोडीशी विश्रांती घेतलीस तर आम्हाला आनंद वाटेल . तू खूप चालतो आहेस असे तुझा अवतार पाहून लक्षात येत आहे . तुला राहायचे तितके दिवस रहा . ताजा तवाना हो . आणि मग पुढे जा . त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना आवाज दिला आणि सांगितले हा मुलगा आपल्या आश्रमामध्ये कधीही आला तरी त्याला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहू द्यावे . आमची स्पेशल परवानगी आहे . स्वामीजींनी इतक्या प्रेमाने आग्रह केल्यावर माझे डोळे पाणावले . आणि मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले . स्वामीजी एका विशिष्ट पद्धतीने आशीर्वाद द्यायचे . अतिशय सुंदर अशा रीतीने त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला . त्यांच्या हातावर मी कधीही पाहिली नव्हती इतकी ठळक खोल आणि लांब भाग्यरेषा होती जी चटकन नजरेत भरायची .आशीर्वाद देताना ते अज्ञाचक्रावर आणि सहस्रार चक्रावर विशिष्ट गतीने आघात करायचे . यांना मर्मबिंदूंचे असलेले ज्ञान हे केवळ आध्यात्मिक नव्हते ! पूर्वाश्रमी हे स्वामीजी न्यूरोसर्जन होते ! आणि संपूर्ण जगभर मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी अविरत प्रवास केलेला होता ! यांची पूर्वाश्रमीची श्रीमंती भल्याभल्यांना थक्क करेल अशी होती . परंतु त्यांनी या सर्व मोहमायेचा त्याग करून संन्यास घेतला . त्यांचे नियम अतिशय कठोर होते . ते कोणालाही शिष्य वगैरे करून घेत नसत . त्यांचे ठरलेले सात भक्त होते . या सर्वांनी मिळून एक कायम निधी उभा केला होता . स्वामीजींचा संपूर्ण खर्च आणि आश्रमाचा संपूर्ण खर्च यातूनच चालायचा . स्वामीजी आश्रमासाठी एक रुपया देखील देणगी घेत नाहीत . आताच्या काळामध्ये हे अतिशय दुर्मिळ आणि आदर्श असे उदाहरण आहे . मी परिक्रमावासींसाठी बांधलेल्या उत्तम अशा हॉलमध्ये आसन लावले . आश्रमाच्या बाहेर बांधलेल्या बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ केली . स्वामीजींनी दिलेले नवे कपडे घालून तयार झालो ! स्वामीजी खोलीमध्ये गेले होते . मग नुसते बसून राहण्यापेक्षा मी स्वयंपाक घरात शिरलो आणि तिथे मदत करायला सुरुवात केली . इथे पोळ्या बनविण्याचे आणि भाजण्याचे सुंदर मशीन होते . एकसारखे फुलके तयार व्हायचे ! आश्रमामध्ये सर्व आधुनिक यंत्रणा होती . स्वामीजींनी आश्रम उभा करताना प्रचंड खर्च केला होता . प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट दर्जाची वापरली होती . स्वामीजींनी इथे तीन ट्रस्ट निर्माण केले होते .

१ ) राजराजेश्वरी महापीठम्

२ ) श्री विद्या महापीठम्

३ ) रम्या परिक्रमावासी निवास

आणि हे सर्व ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला काली मातंगी आश्रम असे नाव दिले होते .

स्वामीजी जगप्रसिद्ध सर्जन असल्यामुळे अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होता . स्वभाव अतिशय कडक होता . वाणीमध्ये जरब होती . प्रचंड अभ्यास करण्याची वृत्ती होती . अद्भुत पाठांतर होते . प्रचंड ग्रंथांतर होते . रोखठोक बोलण्याचा स्वभाव होता . राजकारण या विषयाची प्रचंड घृणा त्यांना होती . हाडाचे तमिळ असल्यामुळे स्वाभाविक मोदी विरोध होता . बाहेरच्या लोकांशी केवळ इंग्रजी मध्ये बोलत . हिंदी चुकून सुद्धा बोलत नसत . स्वामीजी वर्षभर इथे राहिले होते आणि बंगलोरला निघाले होते त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या क्षणी मी तिथे पोहोचलो होतो . एक दिवस उशीर झाला असता तर स्वामींचे दर्शन झाले नसते . किंवा अगदी खालून चालताना वरती न पाहता सरळ गेलो असतो तरी आश्रम मागे पडला असता . मैया काठी जे होते ते चांगल्यासाठीच होते . स्वयंपाक करण्यासाठी दोन पगारी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्या दोघी माताराम निमाडी मध्ये बोलायच्या . सुहास सुरडी यांच्या पत्नी देखील तिथे आलेल्या होत्या . त्यादेखील स्वयंपाक घरात मदतीसाठी थांबल्या होत्या . सुहास ना सर्व भाषा येत असल्यामुळे अस्खलित निमाडी मध्ये ते या स्त्रियांना सूचना करत . त्यांना देखील सुरडी कुटुंबीयांबद्दल खूप आदर होता असे जाणवले . या दोन्ही स्त्रिया परित्यक्ता असून स्वामीजींनी त्यांचा पोटच्या पोरीं प्रमाणे उत्तम सांभाळ केलेला होता . त्यामुळे दोघींना स्वामींबद्दल प्रचंड आदर होता . मी भाजी चिरली . परंतु इतकी भाजी का करत आहे हे मला कळले नाही . कारण जेवणारे फारसे कोणी नव्हते . परंतु नंतर मला लक्षात आले की स्वामीजी आसपासच्या गावातील सर्व मुलांना रोज मोफत भोजन देत ! या भागातील मुलांचे कुपोषण होत आहे असे स्वामींच्या लक्षात आले होते . त्यामुळे या मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी स्वामीजींनी दररोजचे दोन वेळचे मोफत अन्नछत्र सुरू केले होते ! इथे विधवा स्त्रिया , परित्यक्ता आणि लहान मुले यांना दररोज भरपेट भोजन दिले जायचे ! किती मोठे कार्य आहे ! या कार्याला तोडच नाही ! स्वामीजींच्या दोन गाड्या होत्या . बोलेरो गाडी देवा नावाचा तमिळ चालक चालवायचा . आणि स्कॉर्पिओ गाडी मल्लिकार्जुन नावाचा कानडी चालक चालवायचा . या दोघांना मी त्या गाड्या धुवू लागलो . दोन्ही भाषा मला जुजबी येत असल्यामुळे दोघे देखील खुश झाले ! दोघांच्या मनात स्वामींच्या बद्दल प्रचंड आदर होता .जेव्हा नोकराच्या मनात स्वामींबद्दल मनापासून खराखुरा आदर असतो तेव्हा ओळखायचे की हा मालक खरोखरीच चांगला आहे ! स्वामीजी या स्त्रियांना आणि मुलांना भोजन द्यायचे आणि कपडा लत्ता देखील द्यायचे .मी इथे राहिलो त्या काळात स्वामीजींनी मला खूप वेळ दिला . त्या वास्तव्यात खूप काही शिकलो . आश्रम कसा असावा ,आश्रम कसा चालवावा , आश्रम कसा वाढवावा याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजे रम्या परिक्रमावासी निवास आश्रम ! स्वामींनी मला एक फार महत्त्वाचे सूत्र दिले ! Learn to unlearn the things!  वरवर पाहता स्वामीजी कर्मकांडाला फारसे महत्त्व देत नाहीत असे वाटायचे . परंतु त्यांचे संन्यास धर्माचे सर्व नियम ते काटेकोर पाळत होते . त्यामुळे कर्मकांडाला महत्त्व देत नाहीत असे म्हणता येणार नाही . परंतु अनाठायी महत्त्व नक्कीच देत नव्हते .उदाहरणार्थ या आश्रमामध्ये रजस्वला स्त्रियांचा मुक्त वावर असायचा . त्यांना कुठलीही बंधने कुठल्याही दिवशी घातलेली नव्हती ! हे फारच क्रांतिकारक पाऊल आहे ! विशेषतः नर्मदा खंडामध्ये अन्यत्र कुठे असे उदाहरण मला पाहायला मिळाले नाही . असू देखील शकेल परंतु माझ्या पाहण्यात आले नाही .शाळकरी मुली त्यामुळे अतिशय आनंदाने आश्रमात बागडताना दिसायच्या . इथे तीन दैवते स्थापन केली होती . महादेवाची एक भव्य पिंड होती . एक सरस्वती माता होती . आणि एक काली माता होती . या तीनही मूर्ती एका कट्ट्यावर स्थापन केल्या होत्या . आजूबाजूला भिंती नव्हत्या. नर्मदेच्या पार्श्वभूमीवर या देवतांचे छान दर्शन व्हायचे . मीनाक्षी पूजा मंडप नावाची एक जागा बांधलेली होती . मदुराई मीनाक्षी देवीला वाहिलेली ही जागा होती . परिक्रमावासींची सोय देखील अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची केलेली होती . मी सवयीप्रमाणे आश्रमाचा संपूर्ण परिसर बारकाईने पाहिला . मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे नर्मदा मैयाकडे तोंड करून बांधलेल्या ध्यान कुटी होय ! इथे बसल्यावर सरळ तीस किलोमीटर रेषेमधले नर्मदा काठावरचे प्रत्येक स्थान दिसायचे ! ग्यारहलिंगी धर्मपुरी पर्यंतचा परिसर एका सरळ रेषेमध्ये इथून दिसायचा ! जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी ! आश्रम नावाप्रमाणे अतिशय रम्य होता ! 

आश्रमाची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .

मी आश्रमाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला होता परंतु पुढच्या बाजूला असे भव्य प्रवेशद्वार बनविले होते .

अतिशय स्वच्छ व सुंदर परिसराचे महाद्वार देखील तितकेच सुंदर बनवले होते . दोन्ही बाजूला दोन पाट्या होत्या . 

आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली की असा बेटासारखा होऊन जायचा .

ह्याच खडकावरून मी जात असताना मला डावीकडे काहीतरी आहे असे जाणवले आणि मी वरती गेलो तेव्हा आश्रमाचे छोटेसे दार मला दिसले . समोर दतवाड गावाचे डोहकूप दिसते आहे .

हेच ते छोटेसे दार ज्याचे कुलूप उघडे दिसले म्हणून मी आत मध्ये प्रवेश केला होता .

नर्मदा मैया कडे तोंड करून बांधलेल्या ह्याच त्या ध्यान कुटी ! डावीकडे छोटेसे प्रवेशद्वार दिसते आहे .इथे तासंतास बसून मैय्याचे दर्शन करण्यातला आनंद अद्वितीय आहे. ही संकल्पनाच फार सुंदर वाटली ! 

आश्रमामध्ये अशी एक मोठी शेड होती जिथे भोजन प्रसाद दिला जायचा आणि दिवसभर मुलांचा धुडगुस इथे चालू असायचा . कितीही दंगा केला तरी मुलांना स्वामीजी काही बोलायचे नाहीत . मोठ्या माणसांना मात्र चांगलेच शिस्तीत ठेवायचे .

आश्रमामध्ये महाराजांनी अतिशय भव्य असे शिवलिंग स्थापन केले आहे .

या शिवलिंगाच्या कट्ट्यावर शक्यतो कोणाला जाता येत नाही . स्वच्छतेच्या कारणासाठी हे बंधन घालण्यात आले आहे . स्वामीजी पूर्वाश्रमीचे न्यूरोसर्जन असल्यामुळे स्वच्छतेला अतोनात महत्त्व देतात . 

शिवलिंगा शेजारीच सरस्वती देवीची मूर्ती आहे .

सरस्वती मातेच्या शेजारी कालीमाता उभी आहे .या सर्व मूर्ती नेपाळमधील कालीगंडकी नदीतून आणलेल्या काळ्याभोर पाषाणातून मैसूर भागातील कारागिरांनी घडविलेल्या आहेत . अयोध्येतील  बालकराम देखील याच भागातील कारागिराने घडविलेला आहे .मी काही काळ नोकरीनिमित्त मैसूर मध्ये राहिला असल्यामुळे इथली शिल्पकला जवळून पाहिलेली आहे .

महाराजांनी ग्रामस्थांसाठी महाकाली स्मशान घाटाची निर्मिती केलेली आहे . जन्मापासून मृत्यूपर्यंत सुंदर असे पालन पोषण करत हा आश्रम तुम्हाला सांभाळतो !

या आश्रमाची पाटी खरे तर मी लोहारा गावातच पाहिली होती .यातील सूचना वाचून हा आश्रम अतिशय कर्मठपणे परंपरा पाळणारा असेल असे माझे अनुमान होते परंतु अनुभव अतिशय वेगळा निघाला . 

आश्रमामध्ये बांधलेली सुंदर अशी भोजन शाळा

रम्या परिक्रमावासी निवास .खाली आणि वरती परिक्रमावासींची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे .

वर जाण्यासाठी अशा जिन्याची निर्मिती केलेली आहे . या खोलीमध्ये मी फार कमी काळ विश्रांती घेतली . संपूर्ण वेळ आश्रमाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यातच गेला आणि त्यातून खूप आनंद मिळाला !

स्वामीजींच्या आणि माझ्या बऱ्याच आवडी मिळत्या जुळत्या होत्या . मध्येच स्वामीजी बाहेर येऊन गाणी ऐकत बसले होते . तेव्हा त्यांनी उत्तम दर्जाच्या साऊंड सिस्टिम वर सुंदर तमिळ गाणी लावली होती ! गंमत म्हणजे आमची गाण्यांची आवड देखील सारखीच निघाली ! त्यांनी लावलेली तमिळ गाणी मी गातो आहे हे पाहिल्यावर त्यांना फार आनंद वाटला ! त्यांच्यासोबत असलेला हरी नावाचा कोवई अथवा कोइंबतूर येथील शिष्य देखील खुश झाला ! इलाई राजाची जुनी गाणी ठीक आहेत परंतु विद्या वॉक्स नावाच्या अति आधुनिक गायिकेचे माझे आवडते गाणे देखील स्वामीजींचे सर्वात आवडते होते ! पालिवाल भद्रवटकम् नावाचे हे गाणे खरे म्हणजे पारंपारिक देवीचे स्तवन आहे . तिला या विद्या ताईने आधुनिक रूप दिलेले आहे . मी हे आधुनिक रूप आणि जुने गाणे देखील बरेचदा ऐकत असतो . स्वामीजींनी देखील ते त्याच क्रमाने ऐकले . मी हे गाणे तोंडपाठ म्हणून दाखवल्यावर त्यांना फार मौज वाटली . उमामोहनची स्तोत्रे देखील स्वामीजी माझ्याप्रमाणेच ऐकायचे . सध्या डेटा मायनिंग हे क्षेत्र इतके पराकोटीचे प्रगत झालेले आहे की एखाद्या माणसाची आवड ठरविण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे . तुम्हाला काय आवडले पाहिजे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून तुमची आवड दृढमूल केली जाते . किंवा एखाद्या व्यक्तीला काय आवडते हे पाहिल्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती आली की त्याच गोष्टी वाजवल्या किंवा ऐकविल्या जातात . परंतु यासाठी तुमचे प्रोफाईल असलेले डिवाइस तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे . इथे माझ्याकडे काहीच नव्हते त्यामुळे स्वामीजींची ही आवड खरीखुरी होती आणि आमच्या दोघांच्या जुळणाऱ्या आवडी हा योगायोग नव्हता तर वास्तवात असे दिसत होते . तमिळ गाणी गाऊन दाखवल्यावर स्वामीजी भलतेच खुश झाले . त्यांच्याशी इतक्या मोकळेपणाने कोणी संवाद साधत नसे . त्यांची थोडीशी जरब ,दहशत असल्यासारखे होते . परंतु मला तशी काही भीती बाळगण्याचे कारण नव्हते . हीच भिक्षेच्या झोळीची ताकद असते . समर्थ रामदास म्हणतात 

भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती । 

भिक्षेनें प्रगटे महंती । 

स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । 

भिक्षागुणे ।। 

याचा अर्थच मला येथे जणू कळत होता . या आश्रमामध्ये संध्याकाळी अजून काही परिक्रमा वासी आले . ओंकारेश्वर येथून नुकतीच परिक्रमा त्यांनी उचलली होती . यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिले व अजूनही संपर्कामध्ये असलेले एक परिक्रमावासी होते ते म्हणजे तुकाराम बुवा सुरवसे ! हे बीड जिल्ह्यातील वडवणी जवळच्या चिंचाळा या गावातील होते . हे स्वभावाने अतिशय तापट होते . गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते . व्यवसायाने बांधकाम कारागीर होते . पत्नी व हे असे दोघेच राहायचे . अतिशय आनंदी व विनोदी स्वभाव असला तरी शीघ्रकोपी कशाला म्हणतात ते यांच्याकडे पाहून मला कळायचे . एका क्षणात यांच्या रागाचा पारा चढायचा ! धष्टपुष्ट धिप्पाड देहयष्टी असल्यामुळे समोरचे यांना घाबरून असायचे .

चिंचाळा वडवणी बीड येथील तुकाराम बुवा सुरवसे .

हे सध्या सायकल वरून बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहेत . 

तुकाराम बुवांनी परिक्रमा एकट्याने सुरू केली होती . परंतु उशिरा परिक्रमा उचलल्यामुळे त्यांना फारसे कोणी सोबत भेटले नव्हते .त्यातल्या त्यात एक मराठी काका आणि एक मध्य प्रदेश मधील संसारामुळे पिचलेला गांजलेला परिक्रमावासी त्यांना भेटला होता .तिघे काही काळ एकत्र चालत होते .

मध्यप्रदेश मधील हेच परिक्रमावासी तुकाराम सुरवसे यांच्यासोबत होते

तुकाराम बुवांच्या कडक स्वभावामुळे या तिघांचे सतत खटके उडायचे . मध्यप्रदेशातील मनुष्य बिचारा अतिशय गरीब होता . आणि दुसरा मराठी परिक्रमावासी मात्र आगाऊपणाने तुकाराम बुवांच्या खोड्या काढायचा . या तिघांची मजा पाहताना मला फार हसू यायचे ! आणि मी मनोमन मैय्याचे आभार मानायचो की बरे झाले माझ्यासोबत कोणाला गळ्यात बांधले नाहीस ! या आश्रमामध्ये कायमचे राहावे असे कोणालाही वाटावे इतका हा रम्य होता ! इथे सतत छोट्या मुलांचा राबता असल्यामुळे तसे असेल कदाचित . परंतु इथली स्पंदने अतिशय सकारात्मक होती . इथली बंधने देखील अतिशय स्वीकार्य आणि आदरणीय होती . स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला निघताना कट्ट्यावरील तीनही देवांची महापूजा घातली . ते स्वतः कट्ट्यावर जाऊन तिन्ही देवतांना आंघोळ घालतात . याप्रसंगी अन्य कोणीही त्या कट्ट्यावर जात नाही . सर्वजण हात जोडून खाली उभे असतात . आज स्वामीजी जाणार हे माहिती असल्यामुळे गावातील बरेच लोक तिथे जमले होते . मला स्वामीजींनी कट्ट्यावर बोलवून घेतले . आणि आम्ही दोघांनी तीनही मूर्तींना सुंदर असे पंचोपचार पूर्वक अर्चन केले . नंतर मला आश्रमातील लोकांनी सांगितले की असे कोणाला स्वामीजी सोबत पूजेसाठी घेत नाहीत . कट्ट्यावर तर चढूच देत नाहीत . त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात .

हे भाग्य नक्की कसले आहे याचा विचार मी करू लागलो . मी जर माझ्या घरातून थेट या आश्रमात गेलो असतो तरी देखील मला वरती जाण्याची परवानगी दिली असती का . नक्कीच कोणीही दिली नसतीच . ही सर्व कृपा त्या नर्मदा मातेची होती . हा सर्व मानसन्मान त्या नर्मदा मातेला मिळत होता . तिला सोबत घेऊन चालल्यामुळे आमचा सन्मान . नरेंद्र मोदी जेव्हा रोड शो करतात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर फुले उधळतात . त्यातील काही फुले त्यांच्या चालकाच्या अंगावर देखील पडतात . उद्या जर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणू लागला मी अमुक अमुक रस्त्याने जाताना माझ्या अंगावर खूप लोकांनी फुले उधळली तर ते विधान किती हास्यास्पद ठरेल तितकेच मला मिळणारे सर्व मानसन्मान माझे आहेत असे मी म्हणणे हास्यास्पद होते ! यातील काही माझे नव्हतेच ! मी नर्मदा मातेची छोटीशी कुपी घेऊन चालणारा चालक असल्यामुळे तिच्यासोबत मलाही सर्व गोष्टी अनुभवायला मिळत होत्या इतकेच .

बरोबर निघण्याची वेळ झाल्यावर स्वामीजींच्या गाड्या दारात येऊन थांबल्या . मी आणि हरीने स्वामींचे सर्व सामान गाड्यांमध्ये नीट लावले . माझ्या गुरुदेवांनी आयुष्यभर सतत गाडीने प्रवास केला . अक्कलकोट स्वामींनी त्यांना असा आदेश दिला होता की तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहू नकोस . खरे तर हा सन्याशाचा नियम आहे . परंतु गृहस्थ असूनही त्यांनी संपूर्ण ५६ वर्षे हा नियम प्राणपणाने जपला . त्यांच्यासोबत मी अनेक वेळा चालक म्हणून किंवा मदतनीस म्हणून हजारो किलोमीटर प्रवास केलेला आहे . त्यामुळे त्यांनी मला गाडीमध्ये सामान कसे लावावे इथपासून ते बॅगेमध्ये अधिकाधिक सामान कसे बसवावे इथपर्यंत सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत . त्या पद्धतीने सामान लावल्यावर गाडीमध्ये भरपूर जागा मोकळी राहते . त्या अनुभवाचा वापर करत मी सर्व सामान लावून दिले . हरीला आश्चर्य वाटले कारण येताना हेच सामान खूप वाटले होते परंतु जाताना खूपच चोखपणे लागले होते . मी स्वामीजींना नमस्कार करून आज्ञा मागितली . ते मला म्हणाले जेवल्याशिवाय जाऊ नकोस . गावातील सर्व मंडळी हात जोडून उभी राहिली . सुमारे वर्षभर सलग इथे राहून आश्रमाचे बरेचसे काम स्वामीजींनी उरकले असल्यामुळे स्वामीजींच्या सहवासाचे प्रेम सर्वांच्या मनात निर्माण झाले होते . त्यामुळे आता स्वामी ची जात आहेत या कल्पनेने सर्वच जण रडू लागले . नर्मदे हर चा पुकारा करत स्वामीजी निघून गेले . मातीच्या रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या त्यांच्या त्या जीप पहात पहात मी आश्रमाचा दरवाजा लावून घेतला . आणि स्वयंपाकाला लागलो . काजल नावाची एक छोटीशी मुलगी इथे मदत करायची . स्वयंपाक झाल्यावर मुलांची पंगत झाली . रात्री मुक्कामाला आलेले परिक्रमा वासी सकाळीच निघून गेले होते . मी सर्वांचे भोजन झाल्यावर भोजन प्रसाद घेतला आणि झोळी उचलली .  

जाताना सुहास सुरडी यांनी वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला . 

रम्या परिक्रमावासी निवास 

ग्राम -दतवाडा तहसील - अंजड 

जिला -बडवानी

आश्रमामध्ये मला भेटलेले बहुभाषाकोविद सुहास सुरडी

सारे जग फिरून झाल्यावर हा मनुष्य स्वामीजींच्या चरणाशी स्थिरावला होता

मला सुहास पुढचा रस्ता कसा आहे ते सांगू लागले . परंतु मी पुन्हा एकदा मागच्या गेटकडे निघालो . ते म्हणाले मागून रस्ता नाही . परंतु मी त्यांना सांगितले की नर्मदेच्या काठावर कुठेही रस्ता नाही असे होत नाही . त्यामुळे निश्चिंत राहावे ,मार्ग सापडेल . (सुहास सुरडी या माणसाला भेटण्याची प्रचंड इच्छा मनात आहे . अतिशय हुशार आणि विद्वान मनुष्य आहे . गुरूंच्या चरणी भाव कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ आहे ! त्यांनी दिलेला क्रमांक लागत नाही . वाचकांपैकी कोणाच्या परिचयाचे असतील तर मला नक्की कळवावे . )

अशा रीतीने परिक्रमेतील सर्वात कमी चालणे किती असू शकते हे अनुभवत मी या आश्रमाला निरोप दिला . प्रसंगी ५५ ते ६० किलोमीटर अंतर एका दिवसात चालण्याचा अनुभव गाठीशी असताना या आश्रमामध्ये आलो त्या दिवशी केवळ एक किलोमीटर चाललो होतो . परिक्रमेमध्ये तुम्ही किती चाललात ते महत्त्वाचे नसते . तर तुम्ही कुठपर्यंत चाललात हे महत्त्वाचे आहे . चालत तुम्ही कुठे पोहोचलात याला अधिक महत्त्व आहे . कधी गंतव्य स्थानावर पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप चालावे लागते तर कधी पावला पावलावर तुम्हाला थांबण्यासारखी ठिकाणे , माणसे , स्पंदने , निमित्ते भेटतात . बाहेर पडल्यावर दोन डोह कुपे पार केली आणि डाव्या हाताला असलेल्या एका तमिळ साधूच्या आश्रमाने पुन्हा एकदा लक्ष वेधले . आपण हनुमंताला मारुती किंवा हनुमान असे म्हणतो परंतु दक्षिण भारतात अंजनेय असे नाव वापरतात . इथे एक मारुती मंदिर होते .

आञ्जनेय शक्तिपीठम् दतवाडा / अंजड

पुराचे पाणी येत असल्यामुळे येथे अशी बांधकामे असतात

हनुमंताची गोजिरवाणी मूर्ती

आश्रम अगदी काठावर आहे

बाहेरूनच या स्थानाचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो . अजून एखाद्या ठिकाणी थांबणे परवडणारे नव्हते . नावा बंद होण्याच्या आत समुद्रकिनारा गाठणे क्रमप्राप्त होते .

दतवाडा या गावातील अजून एक वैशिष्ट्य आहे . नर्मदेच्या काठावर संपूर्ण अखंडपणे पसरलेल्या एका खडकामुळे इथे नर्मदेला वळण घ्यावे लागते . हा खडक इतका मोठा आहे की या खडकामध्येच एक अखंड घाट कोरलेला आहे ! हा घाट अतिशय सुंदर आहे ! एका दगडात कोरलेला नदीवरील असा घाट जगाच्या पाठीवर अजून कुठे असल्याचे ऐकण्यात नाही ! या घाटातील अक्षरशः प्रत्येक पायरीचे अवलोकन मी बसून बसून केले ! प्रत्येक पायरी वेगळे आणि प्रत्येक पायरी अतिसुंदर होती ! शिवाय या पायऱ्या करताना चुकीला वाव नव्हता . कारण एक चूक झाली की सगळा घाट कामातून गेला ! परंतु तरी देखील प्रत्येक पायरी अतिशय सुंदर पणाने कोरलेली होती . रम्या परिक्रमावासी आश्रमातून बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावर हा घाट लागला . इथे चंगाबाबा नावाच्या संतांची समाधी आहे . तिचे दर्शन घेऊन पुढे निघालो .

चंगा बाबा समाधी मंदिर

चंगा बाबा यांची समाधी

इथपर्यंत येण्याचा सुंदर काठावरचा मार्ग

या भागातील रम्य नर्मदा मैया

तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे !

अहंता मुळीची मुळातून मोडे ! नर्मदे हर !

लेखांक अठ्ठ्याहत्तर समाप्त ( क्रमशः )










No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...