Friday, October 23, 2020

माझा पहिला परदेश प्रवास

 २१ ऑक्टोबरला निघालो. संध्याकाळी वापी रेल्वे स्टेशनहून शताब्दीत बसलो.. बोरिवलीहून मुंबई एअरपोर्टवर पोचलो. लांबूनच आजी-आजोबा आणि नीला आजी दिसल्यावर आदित्य तर पळतच सुटला. आता १५ दिवस त्याच्या डोक्याशी आईची कटकट होणार नव्हती ना...!!!

आपल्या देशातला सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट... मी आणि आदित्य तर डोळे फाडफाडून सगळ्या गोष्टी पाहत होतो. सगळं खूप भव्य-दिव्य वाटत होतं ... (हा आमचा समज लवकरच खोटा ठरणार होता पण त्याचं वर्णन ये‍ईलच पुढे !!) आपण नवीन काहीतरी करायला निघालोय याची उत्सुकता होती !!!! रात्री ११ वाजता चेक-इन होतं...त्यावेळी पोचवणारी योग्य गाडी नसल्याने आम्ही ९.३० लाच पोचलो होतो तिथे (एअरपोर्ट झाडायला !!!) मुंबई बाहेरून येणारे सगळेच लवकर पोचले होते. त्यांच्याशी ओळखी करून घेण्यात, प्राथमिक गप्पा मारण्यात वेळ मस्त गेला. खरं म्हणजे, इथून पुढे १५ दिवस वेळ मस्त जाणार आहे हे आत कुठेतरी माहीत होतं !! कल्याण-डोंबिवलीच्या सहप्रवाश्यांना घेऊन येणारी बस थोडी उशिरा म्हणजे ११.३० ला आली. तोपर्यंत इकडे आदित्यचा जीव वर-खाली व्हायला सुरुवात झाली होती. '११ वाजता चेक-इन' हे त्याच्या डोक्यात होतं - पण म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हतं. '११ ची वेळ टळून गेली म्हणजे आता आपल्याला आपलं विमान मिळतंय की नाही' या विचाराने तो जाम अस्वस्थ झाला होता !!!
शेवटी रात्री पावणे-बाराच्या सुमाराला आमची ४९ जणांची वरात एअरपोर्टच्या आत शिरली. त्यातले बहुतेक जण प्रथमच परदेश प्रवासाला निघालेले - एखाद्या शाळेच्या सहलीला नेताना जसे शिक्षक पोरांना सूचना देत असतात तसेच आमचे सहल आयोजक - श्री. व सौ. शिंदे - ओरडून आम्हाला निरनिराळ्या सूचना देत होते.

कार्गो सामानात काय-काय ठेवायचं, केबिन बॅगमध्ये काय ठेवायचं, पर्स वेगळी हातात धरली तर चालेल का - अनेक शंका आजुबाजूने ऐकू येत होत्या. सगळ्यांचा जाम गोंधळ उडाला होता...काही जणांची टूथपेस्ट पर्समध्ये होती, काही जणांचं कोल्ड क्रीम, काही जणांनी थोडे खाद्यपदार्थ केबिन बॅगमध्ये ठेवले होते...लोकांच्या आपापसातल्या चर्चा कानावर आल्या की ऐकणारे घाईघाईने असलं सगळं सामान इकडून तिकडे हलवत होते. त्यांत मी पण होते म्हणा !! मग अजय खास सल्ला द्यायला पुढे यायचा. ३०-४० मि. ओळीत उभं राहिल्यावर आदित्य कंटाळला. खाण्यापिण्याची दुकानं समोरच दिसत होती - मग साहजिकच, त्याला भूक लागली. एक पिझ्झा, एक बर्गर चापून झाला - तो सुध्दा रात्री १२ वाजता. सगळी मजा वाटत होती.

शेवटी एकदा काऊंटर्स सुरू झाले - श्रीलंकन एअरवेजच्या लोकांनी नव्याच सूचना आणि नियम सांगायला सुरूवात केली. मग लिपस्टिक, टूथपेस्ट, कोल्ड क्रीम गटातल्या वस्तू सगळ्या कार्गो बॅगेत सरकवल्या. बॅग बनवताना बाहेरच्या बाजूला एक कप्पा करण्याचे ज्या कुणाला सर्वात आधी सुचले असेल तो महानच म्हणायला हवा. ज्यांच्या बॅगला असे कप्पे नव्हते, त्यांनी वस्तू सहप्रवाश्यांच्या बॅगमध्ये सरकवल्या. तिथे थोडी मंडळींची तारांबळ उडली खरी पण ही तर सुरूवात होती. पुढच्या १५ दिवसांत सर्वजण 'तय्यार' हो‍ऊन इथून बाहेर पडणार होते. यथावकाश पुढचे सगळे सोपस्कार पार पडले ... इमिग्रेशन, बोर्डिंग पासेस वगैरे ... प्रत्येक काऊंटरपाशी सर्वात आत्मविश्वासाने कोण उभं रहात होतं तर आदित्य !! मान लिया उसको ... एकदम अनोळखी गोष्टी होत्या त्याच्यासाठी खरंतर ह्या, पण कुठेही गांगरला नाही, आमच्या मदतीची गरज लागली नाही ...

इमिग्रेशन काऊंटर पार करून समोरच्या मोठ्या काचेतून एकदम जवळून विमान दिसल्यावर मात्र त्याच्यातलं लहान मूल जागं झालं आणि त्यावेळची त्याची जी उस्फूर्त प्रतिक्रिया होती आणि चेहेऱ्यावरचे जे भाव होते त्याचं वर्णन इथे लिहिणं केवळ अशक्य !!!

विमान समोर दिसत होतं तरी त्यात चढायला अजून खूप वेळ होता. रात्रीचा १ वाजत होता. वेटिंग लाऊंजमध्ये जरा ऐसपैस खुर्च्या मिळाल्यावर मात्र डोळ्यावर झापड यायला लागली. पण तरीही लाऊंजमधले इतर देशी-विदेशी प्रवासी निरखण्याची संधी सोडाविशी वाटली नाही. मला आणि आईला एका टोकाला जागा मिळाली होती आणि अजय, आजी-आजोबांना दुसऱ्या टोकाला. आणि या दोन जागांच्या दरम्यान आदित्य नुसता बोकाळला होता !! असा सराईतासारखा इकडेतिकडे वावरत होता की जणू ते त्याचं घरच असावं !!!
दोन वाजायच्या सुमाराला 'सिक्युरिटी चेक' सुरु झाला. आईच्या बॅगेत नेलकटर होतं आणि सूचना वाचून कळलं की ते केबिन बॅगेत चालत नाही. मग 'घेतलं कशाला, १५ दिवसांत काय तुझी नखं वाढणार आहेत का तिथे' वगैरे वगैरे खास मायलेकींचे संवाद झाले, सापडलं तर इथेच टाकून द्यायचं ठरलं आणि गम्मत म्हणजे बॅगेज स्कॅनिंगमध्ये सापडलंच नाही !!! याला सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी म्हणायचं का?

सिक्युरिटी चेक नंतर पुन्हा एकदा ३०-४० मि.ची प्रतिक्षा आणि शेवटी आदित्य ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला - श्रीलंकन एअरलाईन्सच्या फ़्लाईट नं. यू एल-१४२ मध्ये आम्ही चढलो ... आमच्यापैकी बहुतेक जण आजी-आजोबा वयोगटातले होते ... सीट बेल्टपाशी बऱ्याच जणांचं गाडं अडलं ... मग आसपासच्या आजी-आजोबांना मी त्याचं प्रात्यक्षिक दिलं. ३+३ अश्या सीट्स होत्या , आदित्यने खिडकीची जागा पकडली. वैमानिकाने सूचना दिली. ती सूचना देण्याची पध्दत, फ़्लाईट अटेंडंटचे लाईफ़ जॅकेटचे प्रात्यक्षिक हे सगळं बघायला पण खूप मजा आली ... शेवटी तीन-सव्वातीनच्या सुमाराला 'इमान फलाटावरून हाललं'.

गेले ६-८ महिने ज्याची चर्चा, नियोजन, फोनाफोनी, नेट-सर्फ़िंग इ. इ. सुरू होतं ती आमची सहल सुरू झाली होती ....

 आयुबोवान !!

विमान सुटलं तेव्हा ३ वाजून गेले होते म्हणजे दुसरा दिवस केव्हाच सुरू झाला होता. पण ते मेंदूला कसं कळणार झोप काढल्याशिवाय !!!

वैमानिकाने सूचना दिली आणि एकदम विमानाने वेग घेतला ... आजपर्यंत जास्तीतजास्त ताशी १२० कि.मी. वेगाची सवय ... हा वेग म्हणजे त्याहून 'कै-च्या-कै' होता. थोडा वेळ डोळे मिटून दीर्घ श्वसन करत बसले. साध्या अर्ध्या-एक तासाच्या बस प्रवासातही मला मळमळतं ... त्यामुळे मी मनाची तयारी करुन गेले होते. खिश्यात अव्हॉमिन होती. विमानात टेक-ऑफ़ आणि लॅंडिंगच्या वेळेसच त्रास होतो असं अजयनेच सांगितलं होतं. आश्चर्य म्हणजे मला काहीही त्रास झाला नाही. फक्त टेक-ऑफ़ केल्यावर डोकं एकदम जड झालं आणि दुखायला लागलं. पण त्यात जागरणाचा पण सहभाग होता असं आता मला वाटतंय. आदित्य खिडकीतून खाली पाहत 'आई हे बघ, ते बघ' करत होता. पण मी ते टाळलं. म्हटलं उगीच अजून त्रास नको व्हायला. आजी-आजोबांना काही त्रास झाला नाही. अजयला होणार हे अपेक्षितच होतं. आईला पण झाला थोडा. खूप पोट दुखून उलटी होईल की काय असं तिला वाटलं थोडा वेळ - पण तेवढंच.

श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार आम्ही पहाटे ५ वाजता पोचणार होतो. म्हणजे साधारण अडीच तासांचा प्रवास होता. 'आता जरा झोप काढूया' असा विचार करेपर्यंत खाणं-पिणं यायला सुरूवात झाली. पहाटे पावणेचारला कॉलिफ़्लॉवर मांचुरिअन खाईल का कुणी ??? बऱ्याच जणांनी खाल्लं; ऍपल ज्यूस प्यावंसं वाटेल का कुणाला? आदित्यला वाटलं !!! अर्थात, विमानप्रवासात काळवेळेचा विचार करायचा नसतो हे आम्ही पुढच्या १५ दिवसांत शिकलो आणि जे जेव्हा समोर ये‍ईल, ते तेव्हा निमूटपणे खायलाही शिकलो ... घड्याळाकडे न बघता !!!

जेमतेम डुलकी लागत होती तोपर्यन्त लॅंडिंगची सूचना ऐकू आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी ... आपण आपल्या देशाची हद्द ओलांडून आलोय याची जाणीव झाली, उत्सुकतेने पुन्हा उचल खाल्ली आणि २४ तासाच्या जागरणाला मागे ढकलले. श्रीलंकन क्षितीजावर फटफटत होतं, आमचं विमान उतरत होतं.
आपापलं सामान घेऊन निघालो. दारात हवाई सुंदरी होतीच 'आयुबोवान' करायला ... हा सिंहली भाषेतला 'राम-राम' !! (आणि हो, सिंहली भाषेत 'धन्यवाद'ला 'स्तुती' म्हणतात - ही माहितीत पडलेली अजून एक भर !) दरम्यान, कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिक गप्पा मारत बसलेले आदित्यने पाहून घेतले.

२२ ऑक्टो. - दुसरा दिवस.

बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीलंकेचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ. नकळत तुलना झाली. हा जास्त उजवा वाटला. पर्यटनाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लक्षात आले लगेच. श्रीलंकेच्या चार महत्त्वाच्या उद्योगधंद्यांपैकी पर्यटन हा एक आहे.
Arrival Forms भरले. Visa on Arrival च्या रांगेत उभे राहिलो. पुन्हा एकदा, अतिशय आत्मविश्वासाने वावरणारा एक ११ वर्षांचा मुलगा माझ्या पुढे रांगेत उभा होता !!! त्याच्या नावाची हॅन्डबॅग एका हातात, दुसऱ्या हातात पासपोर्ट आणि फ़ॉर्म ... कुठल्याही प्रश्नोत्तरांना तोंड द्यायच्या तयारीत ... जणू या गोष्टी तो लहान असल्यापासून करत आलाय !!!
व्हिसा, सिक्युरिटी - सगळं पार पडलं. तिथून पुढे आलो. २४ तासांच्या आत पुन्हा इथेच यायचंय याची तेव्हा जाणीव झालेली नव्हती !!! आता डोळे आणि डोकं दोन्ही झोप, झापड, पेंग या सगळ्याच्या पलिकडे पोचले होते. सर्वांनी आपापली घड्याळं तिथल्या वेळेनुसार लावली. 'विमानात बसणे' या पाठोपाठ आदित्य या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता !!! त्याला त्याच्या घड्याळातली वेळ पुढे-मागे करण्यातली मजा अनुभवायची होती.

परकीय चलन - मला आणि आदित्यला जाम उत्सुकता असलेली अजून एक गोष्ट !!! 'आत्ता किती अमेरिकन डॉलर्स बदलून घ्यायचे' यावर एक चर्चासत्र झालं. १ श्रीलंकन रुपया म्हणजे आपले ५० पैसे. त्यामुळे चलन बदलल्यावर एकदम 'मालदार पार्टी' असल्यासारखं वाटायला लागलं. २०-२५ मि. नंतर आमची बस आली. कोलम्बोजवळच निगम्बो म्हणून एक गाव आहे तिथे आमचं हॉटेल होतं. १५-२० कि.मी. अंतर असावं. 'असावं' अश्यासाठी लिहीलं की बस हलताक्षणी मला मळमळायला लागलं होतं ... खिडकीतून बाहेर 'गम्मत' वगैरे बघण्याचं त्राण नव्हतं. वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पाहण्याची संधी हुकली आणि पुन्हा तसंच ... जरा डुलकी लागेपर्यंत हॉटेल आलं. २२ ऑक्टोबरच्या आमच्या दिवसभराच्या कहाणीचं हेच शीर्षक होतं - 'जरा डुलकी लागेपर्यंत ...'

साडेसहाच्या सुमाराला हॉटेल वर पोचलो. सामान आणि खोल्यांच्या किल्ल्या मिळेपर्यंत अजून थोडा वेळ गेला. १० वाजता पुन्हा खाली जमायचं होतं. १५ दिवस भटकायला म्हणून बाहेर पडलेले आम्ही पण त्या क्षणी 'नको आज कुठे जायला' असं वाटत होतं.
MALESIA__001.jpg
खोल्या मस्त होत्या, शिवाय प्रशस्त बाल्कनी आणि समोर समुद्र - क्या बात है !!! अगदी समुद्रकाठावरच हॉटेल उभं होतं. फक्त आत्ता त्या सगळ्याचं रसग्रहण करण्याचा कुणालाही उत्साह नव्हता.
अजयची तर पुरती वाट लागली होती. (ती त्याची तशी अवस्था अजून २-३ दिवस राहणार होती.) त्याने जे गादीवर अंग झोकून दिलं, थोड्याच वेळात तो घोरायला लागला. बसमध्ये एक झोप काढून आदित्य पुन्हा टुणटुणीत झाला होता. आमच्या तीनही खोल्यांमध्ये तो मोकाट वावरत होता. मी पण झोपायचा एक अयशस्वी प्रयत्न केला ...

९ च्या सुमाराला उठून आंघोळ केली, जरा ताजंतवानं वाटलं. खाली जाऊन नाश्ता केला. मी उठवलं नसतं तर अजय तसाच दिवसभर झोपून राहिला असता !!!! पण मी त्याला चलण्याचा आग्रह केला. १०.३० वाजता कोलंबो शहराच्या भटकंतीला निघालो. बसमध्ये पण तो पूर्णवेळ मान खाली घालून, डोळे मिटूनच बसला होता.
बस छान होती - ए/सीत गार वाटत होतं. १५ दिवस उकाडा, घाम, धूळमाती - सगळं विसरायला झालं होतं. आमचा त्यादिवशीचा गाईड - मि. देवा - मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये पण छान, व्यवस्थित माहिती देत होता. मुख्य म्हणजे फालतू चर्पटपंजरी नव्हती. मी त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाबद्दल विचारले. सिंहली, तामिळ, ख्रिश्चन आणि बौध्द हे चार प्रमुख वंश आहेत तिथे. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार रंग झेंड्यावर आहेत. लोकांनी साहजिकच 'रावण' हा विषय काढला. रावण हा तिथे फारसा लोकप्रिय नाही. अशोकवनाची जागा पहायची अनेकांची इच्छा होती. पण रावणाची आठवण म्हणून तिथे कुठलंही स्मारक नव्हतं - निदान कोलम्बोत तरी नव्ह्तं. (तिथे 'कोलम्बो'चा उच्चार 'क्लांबो' असा करतात.) रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे क्रमांक ३-४ वेगवेगळ्या रंगांत रंगवलेले दिसले. म्हणून मी त्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ विचारला. तर एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. २-३ वर्षांपूर्वीपर्यंत तिथे वाहनांच्या क्रमांकांबद्दल कुठलाही नियम नव्हता. ज्याला ज्या रंगाची जशी पाटी हवी तशी तो लावू शकत होता. पण आता नाही. आता त्याचे नियम ठरवले गेले आहेत.
वाटेत २-३ ठिकाणं दाखवली गेली पण बसमधूनच. दुपारी 'स्वातंत्र्य स्मारका'पाशी जेवायला थांबलो. अजय बसमधून खाली उतरून जेवायलाही तयार नव्हता. पण नंतर आला. तिथे आम्ही पाण्याच्या तीन बाटल्या विकत घेतल्या. ३३ श्रीलंकन रुपयांना ३ बाटल्या. परदेशी चलनाने केलेली पहिली खरेदी !!! लगेच मनातल्यामनात हिशोब केला - म्हणजे आपले साडेसोळा रुपये ... फक्त !!! सुटे पैसे परत घेताना कळलं की '१०' ला सिंहली भाषेत 'दहाय' म्हणतात. मी त्या माणसाला लगेच सांगितलं की आमच्या मातृभाषेत पण याला आम्ही 'दहा' म्हणतो. त्याला कितपत कळलं कोण जाणे पण मला सांगताना खूप मजा आली !!!
जेवणानंतर पुन्हा बस निघाली. 'द हाउस ऑफ़ फ़ॅशन'मध्ये खरेदीचा कार्यक्रम होता. आधीच खरेदी माझी आवडीची गोष्ट, त्यात कपड्यांची खरेदी त्याहून आवडीची. तास-दीड तास कसा गेला कळलं नाही. तिथून निघालो, पुन्हा वाटेत बसमधूनच २-३ ठिकाणं पाहिली आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. वाटेत जोरदार पाऊस लागला. हॉटेलवर पोचलो तेव्हा पण पाऊस सुरूच होता. माझा आणि आदित्यचा पोहोण्याचा बेत ओम-फस्स झाला. शिवाय मला समुद्राचे फ़ोटो काढायचे होते ते पण जमलं नाही.
चहा-कॉफ़ी पिऊन सगळेजण आडवे झाले. कधी झोप लागली कळलंही नाही. ७.३० नंतर रात्रीचं जेवण सुरू होणार होतं. ८-८.३० ला जाग आल्यावर उठून जेवून आलो.
जेवण झाल्यावर सौ. शिंदेनी सांगितलं की पहाटे ३ वाजता गजर होईल. गजर झाल्याझाल्या सर्वांनी कार्गो सामान खोलीच्या बाहेर आणून ठेवायचं - म्हणजे सगळं सामान आवरूनच झोपायचं होतं. मनात म्हटलं की 'अरे बाप रे! कसं काय जमायचं !!!' खोलीवर परत आल्यावर अपुऱ्या झोपेपायी काही उलगडेना. त्यात अजय साफ आडवा होता. त्याच्या मदतीची शक्यता नव्हती. कसंतरी करून १० वाजता झोपलो.
जाग ये‍ईल की नाही याची चिंता होती, त्यात त्या फ़ोनचा आवाज इतका मंजूळ होता की त्याने निदान मला तरी जाग येणं कठीणच होतं.

सहलीचा पहिला दिवस अतिशय धावपळीचा गेला होता. दुसऱ्या दिवशी उठून बॅंकॉकला जायचं होतं. पहाटे ३ वाजता उठायचं होतं ...

अपुरी झोप पूर्ण करायला आम्हाला अजून २४ तास वेळ मिळणार नव्हता ...

 रजनीकांत, रावण आणि अल्काझार शो.
जाग न यायला काय झालं होतं ... मला पावणेतीनलाच जाग आली. उठून आवरून खाली आलो. अवेळी उठल्यामुळे २-३ मंडळींचे विधी उरकायला जरा वेळ लागला आणि निघायला थोडा उशीर झाला. पण कदाचित ते सगळं गृहित धरूनच तीन वाजताची वेळ सांगण्यात आली होती. सातच्या विमानासाठी तीन वाजता उठावं लागत होतं ... काही मूठभर नतद्रष्ट लोकांमुळे जगभर विमानप्रवास करणाऱ्या लाखो लोकांना झोप घ्यायला वेळ मिळत नव्हता ...

बस निघाली ... अजयचा त्रास मागील पानावरून पुढे चालू होता. मला आता मळमळत नव्हतं पण बाहेर अंधार होता. त्यामुळे वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पहायची राहिली ती राहिलीच !!!
'कोलंबोत एक दिवस-एक रात्र' हा नुसता भोज्ज्याला शिवण्यासारखा प्रकार झाला होता. यायचं-जायचं 'श्रीलंकन'चं बुकिंग केल्यामुळे ते पॅकेज फुकट मिळालं होतं आणि 'फुकट' या शब्दाला भुलला नाही तर तो माणूस कसला !!! खरं तर 'श्रीलंकन'चं तसंच पॅकेज घ्यावं लागतं असं नंतर कळलं. तरी, त्यातल्या त्यात, 'एअर इंडिया' पेक्षा 'श्रीलंकन' खूपच चांगलं आहे असं अजय म्हणाल्यामुळे जरा बरं वाटलं !!! घरातून निघाल्यापासून आत्तापर्यंतचा दिनक्रम पाहिल्यावर मनाला एक शंका चाटून गेली की आजी-आजोबांना घेऊन येण्यात आपण चूक तर नाही केली ? आपल्यालाच जागरणाचा इतका त्रास होतोय तर त्यांचं काय होत असेल ?? पण सुदैवाने पट्टायानंतर तसं काही झालं नाही, अजय पण पुन्हा माणसांत आला, पण ते सगळं पुढे ...

तर, २४ तासांच्या आत पुन्हा आम्ही विमानतळावर होतो. पण आज नवीनच उत्सुकता होती - दिवसाच्या विमानप्रवासाची !!! पुन्हा एकदा डिपार्चर कार्ड, बोर्डिंग पास, इमिग्रेशन, सिक्युरिटी, सामानाची तपासणी आणि या प्रत्येक ठिकाणी रांगा - सगळं पार पडलं. रोजचे आपले कसे प्रातर्विधी असतात, तसे हे प्रत्यक्ष विमान प्रवासापूर्वीचे प्रातर्विधी आहेत. ते सगळं केल्याशिवाय मजा नाही. तरी बरं, तिथे बोर्डिंगचे चारच दरवाजे होते - पुढे बॅंकॉक, सिंगापूरला तर ते गेट गाठण्याच्या नादात, जशी वेळ असेल त्याप्रमाणे, प्रभातफेरी/सायंफेरी व्हायची सगळ्यांची.

इथे एक विनोद म्हणजे बोर्डिंग पास मिळाल्यानंतरचं जे वेटिंग लाऊंज होतं तिथे टॉयलेट्सच नव्हती. कुणाला जायचं असेल तर दारातल्या कारकुनाकडे आपला बोर्डिंग पास द्यायचा, तिथून बाहेर पडायचं, शंकासमाधान झालं की पुन्हा आपला बोर्डिंग पास घेऊन आत यायचं. त्या दिवशी एक तर सकाळची वेळ, त्यात आम्ही भर मध्यरात्री हॉटेलवरून निघालेलो, त्यात बरीच आजी-आजोबा मंडळी ... त्यामुळे तो तिथला कारकून सारखा बोर्डिंग पासेस घेत होता, परत देत होता !!!
हळूहळू भूक लागायला लागली होती. नाश्त्याचं पॅक मिळणार होतं पण 'ते इथे की विमानात' ते माहीत नव्हतं. सर्वांच्या सुरूवातीच्या आतबाहेर वाऱ्या झाल्यावर नाश्ता मिळाला - प्रत्येकासाठी एक-एक मोठा केकचा तुकडा ... 'सकाळी सहा वाजता भुकेपोटी केक खायचा?' - ये बात हजम नहीं हो रही थी !! पण खाण्यावाचून पर्याय नव्हता. अजयने तिथेही काही खाल्लं नाही. गेल्या चोवीस तासात थोड्या फळांव्यतिरिक्त त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं.

Flight No. UL 422 - Now Boarding असं दिसल्यावर आदित्य टुण्णकन उडी मारून उठला. त्याला कारणही तसंच होतं - 'आजच्या विमानात व्हिडिओ गेम्स खेळता येतील' असं त्याला शिंदे काकूंनी सांगितलं होतं !!! बोर्डिंग गेट पासून विमानापाशी जायला बस होती. त्या बसमधून सगळे 'इश्ट्यांडिंग प्याशिंजर' पाच मिनिटांत विमानापाशी पोचले. फक्त श्रीलंकेतच विमानात शिरण्यासाठी जिना चढावा लागला. इतर ठिकाणी बोगदे होते. पायथ्यापाशी उभं राहून पाहिल्यावर विमानाचा नाकाकडचा भाग छान दिसत होता. मुख्य म्हणजे आपण विमानाच्या असं इतके जवळ कधी येत नाही. त्यामुळे फ़ोटो काढायची इच्छा होती पण 'परवानागी असेल की नाही' अशी शंका आली. कॅमेरा गळ्यात नव्हता आणि 'फ़ोटो काढला तरी चालतो' हे कळून बॅगमधून तो बाहेर काढेपर्यंत जिन्याच्या २-३ पायऱ्या चढून झाल्या होत्या. परत मागे फिरणं मला प्रशस्त वाटलं नाही. अजून तेवढी निर्ढावले नव्हते ना मी ... पण तेव्हा तिथे फ़ोटो काढता आला नाही याची मला अजून चुटपूट लागून राहिली आहे ...
हे विमान आदल्या दिवशीपेक्षा मोठं आणि प्रशस्त होतं. २+४+२ सीट्स होत्या. ठराविक अंतरावर टी.व्ही. स्क्रीन्स होते आणि प्रत्येक सीटच्या पुढ्यात छोटा स्क्रीन आणि रिमोट होता. आदित्यचे हात आता नुसते शिवशिवत होते पण 'टेक ऑफ़' होईपर्यंत थांबायचं होतं.

पहिल्या प्रवासात त्रास न झाल्यामुळे मी या वेळी जरा खिडकीतून बाहेर वगैरे पहायचं ठरवलं होतं. खिडकीतून समोरच विमानाचा पंख दिसत होता. आधी थोडं 'पिचिक' झालं - की खालचं विहंगम दृश्य पाहता येणार नाही म्हणून; पण नंतर लक्षात आलं की टेक ऑफ़ आणि लॅंडींगच्या वेळी पंखांपाशी पण काही यांत्रिक हालचाली सुरू असतात. दरम्यान कधी, कसल्या हालचाली होतात ते बाबांनी मला सांगितलं होतं. ही सीट मिळाली नसती तर ते सगळं पाहता आलं नसतं. त्यामुळे ते 'पिचिक' कुठल्याकुठे विरून गेलं. टेक ऑफ़चा खऱ्या अर्थाने अनुभव घेण्यासाठी मी तयार होते ...
आता त्या 'कै-च्या-कै' वेगाचं काही वाटत नव्हतं. अगदी ठरवून टेक ऑफ़च्या क्षणी खिडकीबाहेर बघितलं ... जे दिसलं ते थक्क करणारं होतं!! खाली दिसणारं दृश्य डोळ्यांत साठवावं की ज्या सुपिक डोक्यातून ही विमान नावाची वस्तू अवतरली होती त्या मानवाच्या मेंदूला सलाम ठोकावा हे कळेना. जमिनीवरच्या सगळ्या गोष्टी हळूहळू छोट्याछोट्या होत गेल्या. काही मिनिटांतच आम्ही वर आणि ढग खाली होते. मध्येच वैमानिकाने 'आता श्रीलंकेतला सर्वात उंच पर्वत दिसेल' असं सांगितलं. त्याचं नाव नाही कळलं पण खिडकीतून दिसला मात्र मस्त!!
इकडे मोठ्या टी.व्ही.स्क्रीन्सवर जगाचा भौगोलिक नकाशा आणि त्यात विमानाची दिशा आणि आगेकूच दिसत होती; थोड्या वेळाने विमानाची उंची, वेग (जो प्रचंड होता), वाऱ्याचा वेग, बाहेरचं तापमान (जे अतिशय कमी होतं) इ. माहिती दिसत होती. त्यानंतर पुढे विमानाच्या नाकाजवळ लावलेल्या कॅमेऱ्याने दिसणारं दृश्य दिसत होतं. त्या सगळ्या गोष्टी पहायला-वाचायला भलतीच मजा येत होती.
आधीच ते विमानाचं धूड आणि केवढा तो त्याचा एक-एक पंख; त्यात इतका वेग आणि बाहेर इतकं कमी तापमान; अश्या परिस्थितीत आपला रजनीकांत त्या पंखावर उभा राहून मारामारी करतो, अमिताभ, धर्मेन्द्र खाली लटकत खलनायकाचा पाठलाग करतात आणि हे सगळं आपण अक्कल गहाण ठेवून बघत असतो! रजनीकांतची मारामारी आठवून त्याक्षणी मला जाम हसू आलं!!!
तेवढ्यात खाणं-पिणं यायला सुरूवात झाली पण त्या क्षणी सगळेच त्याची वाट पाहत होते. पुन्हा एकदा अजयने काहीही खाल्लं नाही. 'आता काय करावं या माणसाला' ते मला कळेना.
पोट भरलं, पुन्हा नकाशे, बाहेरचं दृश्य ... वेळ मस्त चालला होता. आता विमानप्रवास म्हटलं की मला माझा हा प्रवास आठवेल नेहमी.
दरम्यान तिकडे आदित्य व्हिडिओ गेम्सच्या वेगळ्याच विश्वात हरवला होता.
आता हळूहळू खिडकीतून घरं, शेतं, रस्ते दिसायला सुरुवात झाली होती. वैमानिकाने लॅंडिंगची सूचना दिली. वरूनच विमानतळाची भव्यता लक्षात येत होती.

MALESIA__129.jpg

१०-१५ मिनिटात विमान उतरले. पुन्हा एकदा 'आयुबोवान' वगैरे ऐकत आम्ही बाहेर पडलो.

बॅंकॉकचा सुवर्णभूमी एअरपोर्ट, एक-दीड महिन्यापूर्वीच खुला झालेला - केवढा भव्य, प्रचंड ... आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असतात!!! आपला मुंबईचा विमानतळ आठवला - आंतरराष्ट्रीय विमानतळ तसे असतात??? दोन्ही विमानतळांची तुलनाच शक्य नाही. प्रथम दर्शनाने मी तर जाम भारावून गेले. समोरच मोठाच्यामोठा 'डीमन गॉड'चा पुतळा होता ... म्हणजे आपला रावण!!!

MALESIA__006.jpg

त्या परिसरात असे ८-१० पुतळे उभे आहेत. मी एक-एक गोष्ट निरखत होते. तेवढ्यात माणसांची ने-आण करणारे सरकते पट्टे आदित्यला दिसले. एकापुढे एक असे ३-४ होते बहुतेक; तो लगेच त्या पट्ट्यांवरून दोन फेऱ्या मारून आला. आधी एकटाच गेला, दुसऱ्या फेरीला दोन्ही आज्ज्यांनाही बरोबर घेऊन गेला.
इमिग्रेशनपाशी पोचलो. बाप रे ... आधीच्या लाऊंजला भव्य म्हणायचे, तर याला काय म्हणायचे असा प्रश्न पडला. तिथून पुढे आलो तर ... तिथला लाऊंज आधीहून भव्य!! तिथून विमानतळाचे इतर मजलेपण दिसत होते. आमच्या डोक्यावर २-३ मजले सोडून मग वरच्या मजल्यांवरून गाड्यांची वाहतूक सुरू होती - पहावं ते नवलच!!! आमची बस यायला अवकाश होता. आता मात्र अजयला दोन दिवसांत प्रथमच काहीतरी खावंसं वाटलं. पहाटे कोलंबोला मिळालेला केक त्याने तिथे बसून खाल्ला. दरम्यान मी डॉलर्स देऊन थाई बाथ घेतले. बाथ आणि आपल्या रुपयाची किंमत साधारण सारखी आहे. त्या अनोळखी चलनाच्या नोटा निरखण्यात थोडा वेळ गेला. 'बस आली' असा निरोप मिळाला आणि आमची बसच्या दिशेने 'मध्यान्ह फेरी' सुरु झाली. वाटेत खालच्या मजल्यांवर नेणारे सरकते पट्टे लागले. आदित्य लगेच खूष!!
बाहेर पडलो .... मागे वळून पाहिले - विमानतळाचा पसारा नजरेत मावत नव्हता. एक बस आणि एक छोटी व्हॅन - अशी व्यवस्था होती. बस सुरू झाल्यावर सौ. शिंदेनी आमच्या गाईडची ओळख करून दिली - अनंता रुकसानसुक ऊर्फ ऍना. आता पुढचे पाच दिवस पट्टाया-बॅंकॉक सहलीत ती आमच्या सोबत राहणार होती.

'सव्वा दीखा, सव्वा दीख्रब' ... तिनं थाई भाषेत आमचं स्वागत केलं. पाठोपाठ 'नमस्ते' म्हणायला पण विसरली नाही. थाई भाषेत एखाद्या बाईला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीखा' म्हणतात आणि एखाद्या पुरुषाला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीख्रब' म्हणतात.
या ऍनाने पुढच्या पाच दिवसात आम्हाला आपलंसं करून टाकलं. गेली दहा वर्षे ती शिंदेना थायलंडमध्ये मदत करतीये. काही हिंदी, काही मराठी शब्द तिने आत्मसात केले होते. अर्थात, तो तिच्या कामाचाच एक भाग असणार म्हणा. आपल्या कामात ती एकदम चोख होती पण व्यावसायिक कमी, घरगुती जास्त होती. कुठल्याही ठिकाणी चुकामूक हो‍ऊ नये आणि तिला शोधणे आम्हाला सोपे जावे म्हणून तिने जवळ एक निळ्या रंगाची छत्री ठेवली होती. त्याला ती 'नीदी छत्ली' म्हणायची. एखाद्या ठिकाणाहून निघायची वेळ झाली की 'तला, तला' असं ओरडून आम्हाला बोलवायची ... म्हणजे 'चला, चला'!!! एकदोन दिवसांतच आम्ही सगळे तिच्यासारखे बोलायला लागलो होतो.
आम्हाला प्रथम जायचे होते पट्टायाला. 'पाटीया' हा त्याचा खरा उच्चार आम्हाला ऍनामुळेच कळला.
बॅंकॉकहून बसने पट्टायाला जायला अडीच-तीन तास लागतात. बाहेर कडक ऊन होतं. बसपण खूप तापली होती. ऍनाने सांगितले की थायलंडमध्ये उन्हाळा हा एकच ऋतु!!! बाप रे ... कल्पनाच करवली नाही. मग त्यापेक्षा आपली वापीची थंडीही परवडली!!

बॅंकॉकमधले रस्ते, उड्डाणपूल, रस्त्यांवरची स्वच्छता सगळंच पाहण्यासारखं होतं. शहरातून बाहेर पडल्यावर हमरस्त्यावर एका ठिकाणी चहापाण्यासाठी आम्ही थांबलो. 'सेवन-इलेवन' नावाच्या दुकानातून मी पाणी, केळ्याचे गोड चिप्स, बिस्किट्स असं काही-बाही विकत घेतलं. मध, साखर असलेले ते चिप्स पाहून समस्त छत्रे पुरूष खूष झाले. 'सेवन-इलेवन' हे तिथले 'चितळे बंधू मिठाईवाले' असावेत. त्या भागात 'सेवन-इलेवन'च्या दुकानांची साखळी आहे. तशीच दुकाने आम्हाला सिंगापूर, मलेशिया मध्ये पण दिसली.
थाई पोरींची वेशभूषा पूर्णपणे पाश्चात्य शिवाय अंगावरच्या कपड्यांची संख्या आपल्या देशापेक्षा कमी ... त्यामुळे काऊंटरवर पैसे देताना साहजिकच माझं लक्ष त्यांनी वेधून घेतलं!!! त्यात नोटा-नाणी परिचयाची नव्हती. मी त्या काऊंटरवरच्या माणसापुढे जवळचे काही बाथ मांडून ठेवले. त्याच्या लक्षात आलं. त्याने इमानदारीत जेवढं बिल झालं होतं तेवढी नाणी त्यातून उचलून घेतली आणि 'थॅन्क यू, मादाऽऽऽम' म्हणाला. थाई माणसं वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढतात; निदान इंग्रजी बोलताना तरी. थाई भाषेत काय करतात ते कळणं अशक्यच होतं. दक्षिण भारतीय भाषेचं आपण 'यंडु-गुंडु' असं वर्णन करतो, थाई भाषेला काय म्हणायचं काही कळलं नाही.
तिथून निघालो. वाटेत 'मिनी सयाम' पहायला थांबलो - ('मीऽऽनीऽऽ सायाम' - ऍनाच्या भाषेत). प्रवेशद्वारापाशी पुन्हा दोन 'डीमन गॉड'चे मोठेच्यामोठे पुतळे दिसले. थायलंडचं जुनं नाव सयाम होतं - त्यामुळे 'मिनी सयाम' म्हणजे पुरातन थायलंडमधल्या काही गोष्टी छोट्या स्वरूपात पहायला मिळतील असं वाटलं होतं. पण तिथे जगभरातल्या महत्वाच्या वास्तुरचना छोट्या स्वरूपात उभ्या केलेल्या होत्या - अगदी हुबेहूब आणि अप्रतिम. आयफ़ेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा ते सिडनी ऑपेरा हाऊस पर्यन्त सगळ्या. तिथे आम्हाला साधारण तासभर थांबायचं होतं पण तेवढा वेळही कमी पडला.

तिथून पुढे तासाभराच्या अंतरावर पट्टाया. 'एक जगप्रसिध्द पर्यटनस्थळ' हे बीरुद सोडलं तर पट्टाया हे तसं अगदी छोटंसं शहर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या कडेकडेने थोडा वेळ रस्ता होता. लांबून समुद्रकिनारा खूपच सुंदर दिसत होता ... शिवाय रस्ता आणि लगेच समुद्राचं पाणी होतं. मधला वाळू हा प्रकार अगदीच नगण्य होता. तिथून आमचं The Golden Beach Hotel ५-१० मि.च्या अंतरावरच होतं.
तिसऱ्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. १५-२० लोकांना घेऊन जाणारी, दरवाजे आपोआप बंद होणारी मोठी लिफ़्ट पाहून आदित्यचे डोळे पुन्हा चमकले. मुलांना किती छोट्याछोट्या गोष्टींत उत्सुकता असते!! पण त्याहीपूर्वी, प्रवेशद्वाराचे मोठे काचेचे दरवाजे जे त्यांच्या समोर उभं राहिल्यावर आपोआप उघडणारे होते- ते पाहून पण तो खूष झाला होता. पुढच्या दोन दिवसांत खाली आलं की त्याचा एकच खेळ होता - थोडं पुढेमागे करून ते दरवाजे उघड-बंद करायचे पण पूर्ण उघडू द्यायचे नाहीत किंवा पूर्ण बंदही हो‍ऊ द्यायचे नाहीत.
हॉटेलच्या खोल्या कोलंबोपेक्षाही प्रशस्त आणि मोठ्या होत्या. बाल्कनीतून समुद्र मात्र दिसत नव्हता. चहा-कॉफ़ी पिऊन लगेच आम्हाला 'अल्काझार शो' पाहण्यासाठी बाहेर पडायचं होतं.

संध्याकाळी सहा वाजता पुन्हा आमची बस निघाली. अतिशय अरुंद अश्या ४-६ गल्लीबोळातून वळणं घेत आम्ही त्या शोच्या प्रेक्षागृहापाशी पोचलो. आमचा बसचालक भलताच कुशल होता. अरुंद रस्ते, पदपथावरचे विक्रेते - या सगळ्यांतून एक बस जेमतेम जाईल इतकीच जागा होती. पण तो फारच सफाईने चालवत होता.

'अल्काझार शो'विषयी मी पूर्वी कधीतरी एकदा पेपरमध्ये वाचलेलं होतं. त्यामुळे मला त्याबद्दल थोडी कल्पना होती. मुळात तो संगीत आणि प्रकाशयोजनेच्या सहाय्याने सादर होणारा एक अतिशय देखणा नृत्याविष्कार आहे.

MALESIA__025.jpg

थायलंडमध्ये तृतीयपंथीयांची समस्या खूप जटील आहे. म्हणून सरकारने त्यांना या शोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ७०-८० कलाकार तास-दीड तास दिव्यांच्या झगमगाटात, लेसर किरणांच्या चकचकाटात गायन आणि नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. १-२ अपवाद सोडले तर कुठेही हिडीस, अचकटविचकट हावभाव नव्हते किंवा अश्लीलता नव्हती. त्या अपवादांकडेसुध्दा माझं लक्ष गेलं ते तीन म्हातारी माणसं आणि एक शाळकरी मुलगा बरोबर होता म्हणून. नाहीतर त्यापेक्षा कितीतरी हिडीस नृत्यं आपल्या हिंदी चित्रपटात असतात. एकूणएक कलाकार तृतीयपंथी आहेत यावर विश्वास बसणार नाही इतकी सफाई होती त्यांच्या हालचालींत. नंतर त्यांच्या नृत्यांपेक्षा रंगमंचावरचा तो लखलखाट जास्त लक्षात राहिला. ८.३० ला शो सुटला. बाहेर प्रचंड गर्दी आणि गर्दीत ९९% भारतीय लोक!! ऍना आणि तिची 'नीदी छत्ली' नसती तर आमची चुकामूक अगदी हमखास झाली असती.
पुन्हा हॉटेलवर आलो, जेवलो.

थायलंडमधला पहिला दिवस खूप धावपळीचा पण अविस्मरणीय गेला होता. दुसऱ्या दिवशी आम्हाला समुद्रावर जायचं होतं.
२३ ऑक्टोबर संपत आला होता. २० तारखेनंतर आज आम्ही रात्रीची पूर्ण झोप घेणार होतो ज्याची आम्हाला सगळ्यांनाच अतिशय गरज होती ...

 आज मैं उपर ...

सकाळी ७ वाजता गजर होणार होता. सहा-सव्वासहालाच माझी झोप पूर्ण झाली आणि जाग आली. (घरी पण रोज अशी जाग आली तर किती बरं होईल!!) क्षणभर काही उलगडेना - आपण नक्की कुठे आहोत, ही खोली कुठली - काही कळेना! अचानक ट्यूब पेटली आणि झोप उडाली. उठून बाल्कनीत गेले. बाहेर खूप दमट हवा होती. समोर तळमजल्यावरचा निळाशार पोहण्याचा तलाव मस्त दिसत होता. त्यात थोडा वेळ डुंबायचा खूप मोह झाला. पण आज आम्ही तेच तर करणार होतो आणि ते सुध्दा समुद्रावर, म्हणजे सर्वात मोठ्या नैसर्गिक तलावात!!!
तेवढ्यात उजवीकडच्या बाल्कनीत आई दिसली. गजराच्याआधी जाग आली म्हणून मी स्वतःवर खूष होते तर इथे आई आंघोळ वगैरे उरकून तयार हो‍ऊन बसली होती. पण एकंदरच, आमची तीनही म्हातारी मंडळी फारच उत्साही होती. आधीच्या जागरणभरल्या दोन दिवसांत सुध्दा त्यांचा कंटाळलेला, थकलेला चेहेरा मी पाहिला नाही. आईशी थोडा वेळ बोलेपर्यंत डावीकडच्या बाल्कनीतून बाबांचं 'गुड मॉर्निंग' ऐकू आलं. बॅटऱ्या पुन्हा चार्ज झालेल्या होत्या!!!
आज अजून एका गोष्टीची उत्सुकता होती. आज आमच्या सासूबाईंना आम्ही प्रथमच पंजाबी ड्रेसमध्ये पाहणार होतो. सौ. शिन्देंच्या विनंतीवरून त्या ड्रेस घालायला तयार झाल्या होत्या. ड्रेसमध्ये त्या ७-८ वर्षांनी लहान दिसत होत्या. ट्रीपला त्यांना आणून आम्ही बिलकुल चूक केलेली नव्हती. कारण नाहीतर आम्हाला त्यांना ड्रेसमध्ये कधीच पाहता आलं नसतं!! त्या दिवशी बोटीत चढ-उतर बरीच होती दिवसभर म्हणून साडीपेक्षा ड्रेस बरा असा शिंदेंचा सगळ्या आज्यांना सल्ला होता आणि आश्चर्य म्हणजे झाडून सगळ्या आज्या त्या दिवशी पंजाबी ड्रेसेस घालून आल्या होत्या!!! एकेकीला ओळखणं अवघड गेलं आम्हाला.
तर, सगळे तयार हो‍ऊन साडेआठ वाजता खाली आलो. नाश्त्याला मऊ-मऊ, गरमा-गरम उपमा होता. वा! याहून जास्त काय हवं होतं!!! मस्त उपमा चापला, नंतर छान कॉफ़ी होतीच. निघाल्यापासून प्रथमच त्या दिवशी अजयने व्यवस्थित नाश्ता केला. पुरेशी झोप झाल्यामुळे आज त्याचा चेहेरा जरा ताजातवाना वाटत होता.
हॉटेलतर्फेच सगळ्यांना टॉवेल्स देण्यात आले होते. ते घेतले आणि साडेनऊला बस आणि व्हॅन निघाली. पाच मिनिटांतच उतरायचं होतं. फ़ूटपाथ पार केला की लगेच समुद्र. दोन स्पीड मोटर बोट्स उभ्याच होत्या. पाण्यातून बोटीत चढलो. चांगलं गुडघाभर पाणी होतं. बोटी निघाल्या.
एकंदर वेग आणि लाटांवरचे हेलकावे बघता अजयचं - आणि माझंही - काही खरं नव्हतं पुन्हा एकदा. लांबवर इतर बोटी, पॅरासेलिंगची उडणारी पॅराशूट्स दिसत होती. थोड्याच वेळात त्या लटकणाऱ्या पॅराशूट्सपैकी एक माझंही असणार होतं!!!
पट्टायाचा किनारा हळुहळू मागे पडत होता. १५-२० मिनिटांनंतर एका मोठ्या तराफ्यापाशी बोट थांबली. तिथे पॅरासेलिंगसाठी सगळे उतरलो. मी तिकिट काढलं आणि रांगेत उभी राहिले. एक तिकिट - ३५० बाथ. बाप-रे!! आपल्या देशात इतके पैसे देऊन मला नाही वाटत मी अर्ध्या-एक मिनिटाच्या पॅरासेलिंगच्या नादाला लागले असते म्हणून. पण ते सहलीचं, मजा करायचं वातावरण वेगळंच असतं आणि त्यात मी तर वापीतच ठरवलं होतं की पॅरासेलिंग करायचं. थोडा वेळ हो-नाही करताकरता बाबापण रांगेत येऊन उभे राहिले. उत्साह असावा तर असा! आदित्यने मात्र विशेष उत्सुकता दाखवली नाही. मी पण त्याला जास्त आग्रह केला नाही. अजयला पुन्हा बोटीमुळे त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे तो बाद होता. अनुक्रमे, गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आणि रक्तदाबाचा त्रास यामुळे दोन्ही आज्या पण बाद होत्या. म्हणजे आमच्यातले दोनच गडी मैदानात उतरले होते.
जरा वेळाने लाईफ़-जॅकेट्स अंगावर चढली. तो सगळा प्रकार भलताच बोजड होता. ह्या असल्या सगळ्या वजनदार वस्तू अंगावर चढवून लोकं रिव्हर-राफ़्टींग, पॅरासेलिंग, ग्लायडींग कशी काय करतात कोण जाणे. कदाचित त्यातला थरार त्यांना जास्त भावत असेल.
रांगेतले पुढचे लोक टेकऑफ़ करताना, खाली उतरताना मी निरीक्षण करत होते. तिथले मदतनीस फारच चपळाईने हालचाली करत होते. एका माणसाला पॅराशूटपासून सोडवायचं आणि त्याच हूक्सना पुढच्या माणसाला अडकवायचं आणि हे सगळं काही सेकंदांच्या आत, वारा जोरात वाहत असताना, पॅराशूटमध्ये पूर्ण हवा भरलेली असताना ... खायचं काम नव्हतं!!! सगळे घामेघूम झाले होते. ओरडून सूचना देऊन सगळ्यांचे घसे बसलेले होते. एक व्यक्ती उतरत-उतरत आली की ४-५ जण लगेच धावत त्याला पकडायचे आणि अलगद त्याचे पाय खाली टेकवायचे, पॅराशूटपासून सोडवून त्याला तिथून हाताला धरून अक्षरशः हाकलायचे. तोपर्यंत अजून दोनजण पुढच्या माणसाला पकडून त्या जागी उभे करायचे, सोडवलेले हूक्स त्या माणसाच्या जॅकेटच्या हूक्समध्ये अडकवायचे, की मोटरबोटवाला सुसाट निघायचा. पॅराशूटची दोरी त्या बोटीला बांधलेली ... बोटीने वेग घेतला की पॅराशूट वर, वेग कमी झाला की पॅराशूटची उंची कमी-कमी व्हायला लागायची. या एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त ४-५ सेकंदांत पार पडायच्या. एक माणूस उडतोय न उडतोय तोपर्यंत आधी उडलेला एखादा उतरायचा - हे असं अविरत चाललेलं होतं.
रांगेत मी पुढेपुढे सरकत होते ... पण मला भीती वगैरे बिलकुल वाटत नव्हती. घाबरायचं केव्हा, जेव्हा ताबा ठेवण्याचं काम आपल्या हातात असेल. तिथे माझ्या हातात काहीच नव्हतं. सगळी भिस्त मला लटकवणाऱ्या त्या दोन हूक्सवर. पाण्याची भीती तर मला कधीच नव्हती शिवाय लाईफ़-जॅकेट्स होतीच. माझ्या आधीचा माणूस उडला, तो वर जाताना पाहत होते तेवढ्यात डावीकडून एक उतरला. खस्सकन मला ३-४ जणांनी ओढलं, हूक्स अडकवले. त्यांनी सांगितलं त्यापेक्षा भलतीकडेच मी दोर पकडले हाताने तर त्यांतला एक माझ्यावर जाम भडकला. बिच्चारे! ते तरी काय करणार. काही अपघात झाला तर लोक आधी त्यांनाच धरणार ना. त्यामुळे मला त्या माणसाचा राग नाही आला. आधीच त्यांचं मोडकंतोडकं थाई उच्चारांचं इंग्रजी, त्यात डोळ्यांशिवाय त्या सगळ्यांचे चेहेरे रुमालाने झाकलेले. त्यामुळे ते काय सांगताहेत ते काहीही कळत नव्हतं. त्याने चिडून 'माझ्या डोळ्यांकडे बघ' अशी खूण केली. मग माझ्या डोक्यात शिरलं की तो मला कुठले दोर धरायला सांगत होता ते. जरा 'सॉरी' वगैरे म्हणायचा विचार करत होते पण वेळ निघून गेली होती ... मी केव्हाच वर उडालेली होते ...
त्या क्षणी जे वाटलं त्याचं शब्दांत वर्णन करणं केवळ अशक्य!! १-२ सेकंद मी श्वास घ्यायचा विसरले. पक्ष्यांसारखे पंख नसल्यामुळे मनुष्यप्राणी कुठल्या आनंदाला मुकतो त्याची कल्पना ना जमिनीवरून येत ना विमानात बसून!! बोटीला ब्रेक लागला की लटकणारे पाय पुढेमागे झुलायला लागायचे आणि पॅराशूट हळुहळू खाली-खाली यायला लागायचं. वेग वाढला की पुन्हा वर, की पुन्हा श्वास घ्यायचा विसर पडायचा. बोटीने त्या मोठ्या तराफ्याला एक फेरी मारली. उंची आणि वेग जरा अंगवळणी पडे-पडेपर्यंत उतरायची वेळ आली सुध्दा!! तोपर्यंत एक हात सोडायचा धीर पण आला होता. अजय खाली कॅमेरा घेऊन तयार होता. मी चक्क त्याला एक 'पोझ' वगैरे दिली हात हलवून.

4029-12.jpg

खरं म्हणजे, टेक ऑफ़ करताना सुध्दा हाताने दोर धरले नसते तरी चाललं असतं हे नंतर लक्षात आलं. पण त्यासाठी पुन्हा ३५० बाथ कोण खर्च करणार!!!
... जसं टेक ऑफ़ कधी झालं ते कळलं नाही तसंच खाली उतरून अंगावरचं लाईफ़-जॅकेट कधी निघालं तेही कळलं नाही. पण माझ्या चेहेऱ्यावर आता 'लई मोटं मैदान' मारून आल्याचे भाव होते. आमच्यापैकी बरेचजण रांगेत उभे होते पण उड्डाण सर्वप्रथम मी केलं होतं!! त्यामुळे आपला भाव आता एकदम वधारला होता. सगळ्यांनी मला पकडून नाना प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी पण अगदी जग जिंकल्याच्या थाटात त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, काही आज्यांना धीरही दिला!! जरा पाणीबिणी पिऊन इतरांची मजा बघायला पुन्हा पुढे जाऊन उभी राहीले. आता बाबांची उडायची वेळ आली होती. पुन्हा तेच ना, आपल्या हातात काहीच नसतं करण्यासारखं .. त्यामुळे बाबा नीट जातील ना, त्यांना काही अडचण नाही ना येणार या शंकांना काही अर्थ नव्हता. त्यांनी पण मस्त मजा घेतली. मग इतरांचं होईपर्यंत पुन्हापुन्हा तो क्षण आठवत राहिले. पूर्ण १५ दिवसांच्या सहलीत कोलंबो-बॅंकॉक प्रवासापाठोपाठ हा अनुभव मनावर कायमचा कोरला गेला होता. २४ ऑक्टोबर २००६ हा दिवस आता मी कधीही विसरणार नाही.

अर्ध्यापाऊण तासाने तिथून सगळे निघालो. आता कॉरल आयलंडला जायचं होतं. पुन्हा एकदा हेलकावे खाणारी बोट ... नको वाटत होतं. ३०-४० मिनिटांचा प्रवास होता. वाटेत पुन्हा एक मोठा तराफा लागला. २-४ इच्छुक मंडळी तिथे 'स्कूबा डायव्हिंग' साठी उतरली आणि आमची बोट पुढे निघाली. का कोण जाणे, पण स्कूबा डायव्हिंग मला नाही करावसं वाटलं. पाण्याखालचं विश्व मला म्हणावं तेवढं आकर्षित करत नाही कधी. 'डिस्कवरी'वरचे त्या प्रकारचे कार्यक्रम पण मला कंटाळवाणे वाटतात कधीकधी. मला खरंच त्याचं कारण माहीत नाही!!!
कॉरल आयलंडवर उतरलो. किनाऱ्यावर बसायला आरामखुर्च्या आणि वर मोठ्ठ्या छत्र्या - अश्या लांबच्यालांब रांगा होत्या. खुर्च्या दिसल्यावर आमची इकडची स्वारी पुन्हा एकदा खुर्चीत सांडली ... मान खाली घालून, डोळे मिटून बसून राहिली!!
पाणी एकदम स्वच्छ, निळं-हिरवं होतं. वाळू पांढरी. समुद्राचा तळ अगदी स्पष्ट दिसत होता. काही अंतरापर्यंत पोहण्यासाठी वगैरे पाणी सुरक्षित होतं. तिथपर्यंत दोर लावून ठेवलेले होते. त्यापुढे जायला बंदी होती. आदित्यला स्कूटरबोटवर बसायचं होतं. त्याचं तिकीट काढलं. रांग होतीच. पण फार वेळ उभं रहावं लागलं नाही. स्कूटरबोटवर पुढे लाईफ़-जॅकेटसकट आदित्य आणि मागे एक मदतनीस - असे निघाले. बोट निघाल्याक्षणी पुढून पाण्याचा मोठा फ़वारा त्याच्या अंगावर उडला. त्याला तेच हवं होतं. थोड्याच वेळात तो दिसेनासा झाला. ५-१० मिनिटांनी परत आला तेव्हा तो पूर्ण भिजलेला होता आणि चेहेरा मात्र आनंदाने फुललेला होता. पैसे (की बाथ??) वसूल झालेले होते.
आता त्याला माझ्याबरोबर पाण्यात खेळायचं होतं. बाबा पण आले आमच्याबरोबर. पाण्यात कितीही वेळ घालवता येतो. अर्धा-एक तास, दोन तास - कमीच वाटतात. किती वेळ पाण्यात होतो माहीत नाही. पण निघायची वेळ आली तेव्हा नेहेमीप्रमाणे आदित्यला बाहेर यायचं नव्हतं ... खरं म्हणजे मला सुध्दा!!! पण पट्टायाला परत जाऊन जेवायचं होतं.
पाण्यात खेळायला मजा येते पण नंतर भूकही लागते फार. अजय बसला होता तिथे एक माणूस मक्याची उकडलेली, गरमागरम कणसं विकत होता. त्यातल्या चार कणसांच्या दाण्यांवर आमची नावं लिहिलेली होती त्यामुळे आम्हाला ती खाणं क्रमप्राप्त होतं!!! पण किंमत ऐकून ती लिहिलेली नावं पुसून टाकावीत या निर्णयापर्यंत मी आले होते कारण किंमत खूपच जास्त होती आणि 'भाव करणे' हा माझा प्रांत कधीच नव्हता. शेवटी सासूबाईंचं प्रॉंप्टिंग, त्या माणसाला कळतील असे ४-२ इंग्रजी शब्द आणि भरपूर हातवारे आणि खाणाखुणा - एवढं सगळं झाल्यावर दोन्ही गटांचं समाधान होईल असा सौदा पक्का झाला आणि ती चार कणसं इप्सीत स्थळी जाऊन पोचली. त्या मेजवानीची मजा काय वर्णावी!!!
तिथून 'तला-तला' झाल्यावर सौ. शिंदेंनी सांगितलं की आता काचेचा तळ असलेल्या बोटीतून एक फेरी आहे ज्यात पाण्याखालची कॉरल्स पहायला मिळतील. अरे वा! अजून एक नवा अनुभव! उत्साहात सगळे त्या काचेचा तळ असलेल्या बोटीत बसलो. तर कुठलं काय, तो काचेचा तळ की काय - तो कुठेच दिसेना. मग लक्षात आलं की बोटीत तळाशी लांब फळ्या असतात त्यांपैकी एक फळी पारदर्शक ऍक्रिलिकची बनलेली होती. रुंदी जेमतेम ८-१० इंच!!! अमोरासमोर आम्ही बसलो होतो ... 'खाली वाकून डोक्यावर पूर्ण टॉवेल्स पांघरून घ्या' अशी सूचना आली. ते थाई मिश्रित इंग्रजी समजायला आम्हाला पाच मिनिटं लागली. वरच्या उन्हामुळे पाण्याचा तळ दिसत नव्हता, तो टॉवेल्सची सावली धरल्यावर एकदम दिसायला लागला आणि त्यातली कॉरल्स पण. जरा त्याला नजर सरावते न सरावते तोच ती फेरी संपली!!! 'हात्तिच्या- एवढंच?' असं झालं सगळ्यांना. ती फेरी अजून ५-१० मिनिटं तरी जास्त हवी होती असं वाटलं. कारण तेवढ्या वेळात सुध्दा जी काय ४-२ कॉरल्स पाहिली ती अप्रतिम होती. कदाचित स्कूबा डायव्हिंग केलं असतं तर ती जास्त चांगल्या रितीने पाहता आली असती. पण आता 'जर-तर'ला थारा नव्हता; ती बोट सोडून आम्ही पुन्हा स्पीड मोटर बोटीत चढलो होतो आणि परतीच्या वाटेला लागलो होतो.

वाटेत पुन्हा मगाचचा पॅरासेलिंगचा तराफा दिसला. तशीच रांग होती, तशीच माणसं उडत होती, उतरत होती; तशीच त्या मदतनिसांची धावपळ सुरू होती. आम्ही पॅरासेलिंगचा अनुभव कधीही विसरणार नव्हतो पण तिथे काम करणाऱ्या त्या लोकांना लक्षात ठेवण्यासारखं काही विशेष होतं का? त्यांच्या दृष्टीने दोन वेळची भ्रांत मिटवण्याचं ते केवळ एक साधन होतं. दृष्टिकोन बदलला की एकाच गोष्टीचं किती वेगळं रूप समोर येतं!!

परतताना बोट जरा जास्तच हेलकावे खात होती. त्यामुळे मला पण त्रास व्हायला लागला. 'कधी पोचतोय' असं झालं होतं. शेवटी एकदाचा किनारा गाठला. उतरून रस्त्यावर आलो तर तिथे आमचेच पॅरासेलिंगचे फ़ोटो मांडून ठेवलेले होते विक्रीसाठी!!! एक फ़ोटो - १०० बाथ. पैसे कमवायचे किती मार्ग शोधून काढतो माणूस!!! त्या फ़ोटोंचं ते नंतर काय करत असतील असा मला प्रश्न पडला.
बसमध्ये बसायचं तर बस कुठे दिसेना. त्या ऐवजी ऍनाने आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका नळापाशी नेलं आणि तिथे पाय धुवायला सांगितलं. माझे पाय काही फारसे खराब नव्हते म्हणून मी तशीच पुढे चालायला लागले तर तिने मला परत बोलावलं. पायांची सगळी वाळू धुवून काढल्याशिवाय बसमध्ये कुणालाही प्रवेश नव्हता असं कळलं. मी निमूटपणे पाय धुतले. त्या इमारतीच्या पलिकडे आमची बस उभी होती. तिथून निघून हॉटेलवर परत आलो.

जेवणानंतर विश्रांतीसाठी थोडा वेळ होता. त्यानंतर 'जेम्स गॅलरी' ला भेट द्यायची होती. हॉटेलवर आल्यावर आमच्या सासूबाईंनी पहिली गोष्ट काय केली असेल तर पंजाबी ड्रेस बदलून पुन्हा साडी नेसली!!! 'जेम्स गॅलरी'ला अजय आलाच नाही. काहीही न खातापिता तो तसाच खोलीत झोपून राहिला. 'ह्याला ट्रीपला आणून चूक केली' असं आता मला वाटायला लागलं होतं!!!!!!

एका मोठ्या दिमाखदार, दुमजली इमारतीत ती खाजगी 'जेम्स गॅलरी' आणि दुकान आहे. आत शिरल्याशिरल्या एक छोटी 'ट्रेन राईड' होती सर्वांसाठी. लहान मुलांच्या बागेत असते तशी एक चार डब्यांची छोटी गाडी होती. ती १५-२० मिनिटांत आपल्याला फिरवून आणते एका अंधाऱ्या गुहेतल्या मार्गावरून. मौल्यवान रत्नं कशी बनतात, पुरातन काळापासून जडजवाहिऱ्यांचा व्यवसाय कसाकसा बदलत आला इ. वर्णन करणारे देखावे वाटेत ठिकठिकाणी उभे केलेले होते आणि एकीकडे ध्वनिमुद्रित समालोचन सुरू होतं. मजा आली ते पहायला आणि ऐकायला!! कंटाळवाणी ठरणारी माहिती लोकांनी आवडीने ऐकावी यासाठी केलेला तो एक छानच प्रयत्न होता. त्यानंतर आम्ही रत्नांना पैलू पाडण्याचं काम चालू होतं तिथे गेलो. ते अतिशय जिकीरीचं काम असतं हे माहीत होतं पण प्रत्यक्ष तेव्हा पहायला मिळालं. तिथून मग मुख्य दुकानात गेलो. ते फारच भव्य आणि प्रचंड होतं. लोकांच्या जिभांवर लगेच - पु. लं. च्या भाषेत - सरस्वतीने क्लास उघडला - 'गाडगीळांची १० दुकानं मावतील यात, एक जेम्स गॅलरी पौड रोडवर सुरू केली तर त्याची त्यांनी केवढी जाहिरातबाजी केली, इथे येऊन पहा म्हणावं. याची सर तरी आहे का त्या दुकानाला ...' वगैरे, वगैरे!! आता, ते दुकान भव्य होतं हे खरंच, गाडगीळांची १० दुकानं खरंचंच तिथे मावली असती पण म्हणून गाडगीळांना खुन्नस द्यायची काही गरज होती का!!! आणि गाडगीळांना 'इथे येऊन पहा' म्हणायला त्यांनी काय ती पाहिली नसेल का!!! पण अश्या गप्पा नाही झाल्या तर आपलं मनोरंजन तरी होणार कसं, नाही का!! त्यामुळे मी त्या सगळ्या गप्पांची मस्त मजा घेतली. कारण नाहीतर त्या दागदागिन्यांत मला विशेष रस नव्हता. अर्थात, अनेक अनमोल रत्नं, ज्यांचे आजवर फक्त फ़ोटोच पाहिले होते, ती सगळी तिथे प्रत्यक्ष पाहिली - विविध आकार-प्रकारांत. हौशी मंडळी किमती विचारत होती, अव्वाच्यासव्वा किमती ऐकून, चेहेरे पाडून पुढे सरकत होती. काहींनी थोडीफार खरेदी पण केली. आम्ही पाचजण सगळीकडे एक चक्कर मारून बाहेर पडलो.

सहा-सव्वासहाला तिथून निघालो. त्या दिवसाचं शेवटचं आकर्षण होतं - थाई मसाज. अर्थात ते ऐच्छिक होतं. आदल्या दिवशीच बॅंकॉकहून येताना ऍनाने त्याबद्दल सांगितलं होतं. थाई मसाजचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा असं सौ. शिंदेंचं पण मत होतं. आधी मी फारशी उत्सुक नव्हते. तर अजयने मला आग्रह करुन माझं पण नाव दिलं होतं यादीत आणि आज तो स्वतःच झोपला होता खोलीत. मग मी, आदित्य आणि माझी आई - असे तिघेजण गेलो. इतरही बरेचजण होते. थाई मसाज केंद्र आमच्या हॉटेलला लागूनच होतं. ७ ते ९ आम्ही तिथे होतो. थाई मसाज म्हणजे एका विशिष्ट शास्त्रोक्त पद्धतीने हात-पाय-डोकं चेपणे. 'मसाज' या शब्दाने अनेकांचा गैरसमज होतो, माझा पण झाला होता. पण त्याने खरंच शरीर आणि मन हलकं झालं. इथे वापीत रोज असे कुणी हातपाय चेपून दिले तर किती बरं होईल असं वाटलं.

९ वाजता परत हॉटेलवर आलो. आई-बाबा जेवतच होते. अजय दिसला नाही कुठे. तो जेवायलाही खाली यायला तयार नव्हता. आता मात्र हद्द झाली. मी जेवले, वर गेले आणि अक्षरशः त्याला झापलं. जरा चिडूनच, जबरदस्तीने खाली घेऊन आले. थोडा हलकं जेवण आणि नंतर औषध घ्यायला लावलं. अजयची आता मला जरा काळजीच वाटायला लागली होती. विमान प्रवास, बस प्रवास आता १५ दिवस असणारच होता अधूनमधून. मग त्याचं हे असंच सुरू राहणार की काय ... काही कळेना. थोडा हलका आहार आणि योग्य औषधं - हाच एक उपाय होता त्यावर.
त्यादिवशी त्याने घेतलेल्या औषधांचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसणार होता. आमचं पट्टाया वास्तव्य संपलं होतं. दुसऱ्या दिवशी बॅंकॉकला जायचं होतं. बॅंकॉकला अजयचा कुठला चेहेरा दिसणार होता???

 आमचं पहिलं भांडण ...

रोज संध्याकाळी 'बाय-बाय' म्हणायची वेळ झाली की ऍना आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या तीन वेळा सांगायची - म्हणजे ७.००, ७.४५, ८.४५ किंवा ६.००, ७.००, ८.०० अश्या. त्या तीन वेळांपैकी, पहिली वेळ जेव्हा ६ पेक्षा जास्त असायची (जे फार क्वचित व्हायचं ...) तेव्हा सर्वात पहिला मला आनंद व्हायचा कारण त्या वेळा अनुक्रमे गजर, नाश्ता आणि हॉटेलमधून निघण्याच्या असायच्या!!!
त्यादिवशी पट्टाया सोडायचं होतं, साहजिकच चेक-आऊट असल्यामुळे सहा वाजता गजर होणार होता. काय करणार ... बॅंकॉक पहायचंय ? मग उठा लवकर ... !!! दोन दिवसांपासून त्या हॉटेलची एक लिफ़्ट बिघडली होती. मग एकतर एकाच लिफ़्टची वाट पाहत रहा उभं १०-१५ मिनिटं किंवा जिने चढा. बहुतेक वेळेला जिनेच चढावे लागायचे. त्यामुळे गुडघेदुखीवाली मंडळी जरा वैतागलीच होती. तरी बरं, खोल्या तिसऱ्या मजल्यावरच होत्या. त्यामुळे त्यादिवशी खाली येताना सर्वांच्या चेहेऱ्यावर जरा समाधान होतं की 'चला, आता इथून पुढे जिने चढावे लागणार नाहीत.'

काउंटरवर 'चेक‍आऊट' असं सांगून ज्याने-त्याने किल्ल्या 'ड्रॉप बॉक्स' मध्ये टाकायच्या होत्या. आदल्या दिवशी आमच्या रूमची किल्ली रिसेप्शनवाल्यांच्या हातूनच गहाळ झाली होती कुठेतरी. (नंतर ती सापडली म्हणे.) सकाळी कॉरल आयलंडला निघताना मी व्यवस्थित ड्रॉप बॉक्समध्ये टाकली होती. रात्री परत आल्यावर ती सापडेना म्हटल्यावर सगळेजण उगीचच माझ्याकडे संशयित नजरेने पहायला लागले होते. ती रिसेप्शनिस्ट तर काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. तावातावाने बोलताना थाई माणसं आपले डोळे मिटून घेतात आणि वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढत बोलतात. तिची भाषा कळली नाही पण 'डोकं भडकलंय' हे तर समजलंच लगेच. शेवटी, मास्टर-की ने आमची खोली उघडावी लागली होती. ते करणारी रूम-सर्विसवाली मुलगी पण 'एक साधी किल्ली नाही सांभाळता येत' असा चेहेरा करून आमच्याकडे पाहतपाहत निघून गेली होती. थोडक्यात काय, त्या दिवशी चेक‍आऊट करतानासुध्दा मी रिसेप्शन काउंटरवरच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हातवारे करून आणि मगच ड्रॉप बॉक्स मध्ये किल्ली टाकली. बाद में खालीपीली झंझट नहीं मंगता था अपुन को !!!
८.००-८.३० ला चेक‍आऊट करून, सामानासकट आम्ही निघालो. अर्धा दिवस पट्टाया परिसरातच रहणार होतो आम्ही पण पुन्हा हॉटेलवर यायचं नव्हतं. आज आमचा दौरा होता 'नॉंगनूच व्हिलेज'ला. (नॉंगनॉश व्हिलाश - इती ऍना); किंवा कदाचित तोच खरा थाई उच्चार होता त्या शब्दांचा. ३०-४० मिनिटं होती तिथे पोहोचायला. असा वेळ मिळाला की ऍना आमच्याशी गप्पा मारायची. थाई लोक, त्यांची संस्कृती, कुटुंब व्यवस्था, शिक्षणपध्दती याबद्दल बोलायची. तिथे लग्नाच्या वेळी नवऱ्याला हुंडा द्यावा लागतो आणि मोठ्यांची काळजी घेण्याचं वचन द्यावं लागतं असं कळलं. 'थाई लोक कुटुंबात रमणारे आहेत' असं तिने सांगितलं. तिथे शाळा-कॉलेजमध्ये दुय्यम भाषा शिकवत नाहीत. पूर्ण देशभर एकच भाषा शिकवली जाते, बोलली जाते. आपल्याला इंग्रजी येत नाही याचा त्या लोकांना सतत एक न्यूनगंड वाटतो. ऍना म्हणाली - 'तुम्ही भारतीय लोक जगभर कुठेही फिरा, इंग्रजी येत असल्यामुळे तुमचं कुठेही अडत नाही पण आम्हाला बाहेर गेलं की खूप अवघड जातं.' ते ऐकून तमाम पब्लिक खूष झालं ... मनातल्या मनात. पण चेहेऱ्यावर कुणी काही दाखवलं नाही. आपली 'इंग्रजी ज्ञानाची सव्वा लाखाची झाकली मूठ' कोण कशाला विनाकारण उघडेल !!! म्हणजे बघा, तिथे ते चित्र आणि इथे आपल्याकडे 'इंग्रजीचा अतिरेक, फाजिल लाड' म्हणून आरडाओरड चाललेली असते. लोकांना जिथे जे सहजासहजी मिळतं तिथे ते त्यांना नकोसं झालेलं असतं हेच खरं. दरम्यान, नॉंगनूच व्हिलेजच्या परिसरात बस शिरत होती त्यामुळे त्या गप्पा तिथेच थांबल्या.

एक ६०-७० वर्षांची थाई म्हातारी, तिच्या नावावर शेकडो एकरांची जमीन होती. कुठल्याही उद्योगधंद्याला किंवा गृहनिर्माण योजनेला ती जागा न विकता तिने ती तशीच मोकळी ठेवली, तिथे बागा बनवल्या, मोठमोठाली तळी खोदली, जगभरातली निरनिराळी झाडं, फुलझाडं तिथे आणून लावली आणि त्या जमिनीचं अक्षरशः सोनं करून टाकलं - ते हे 'नॉंगनूच व्हिलेज'.

4029-25_1.jpg

त्याचा पसारा सांभाळता यावा म्हणून तिनं लग्न देखील केलं नाही. ती झाडं इतकी कलात्मक रीतीनं लावली होती की काय-काय बघावं आणि नजरेत साठवावं असा प्रश्न पडला. आदल्यादिवशीच्या त्या गाडगीळांच्या दसपट असलेल्या जेम्स गॅलरीपेक्षा निसर्गाचं हे वैभव पहायला मला केव्हाही जास्त आवडलं असतं.

तासभर त्या बागेत घालवल्यावर पुढचा कार्यक्रम होता 'थाई कल्चरल शो'. नॉंगनूच व्हिलेजमध्ये झाडांचं प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी एका विशिष्ट मर्यादेनंतर कुठल्याही वाहनांना जायची परवानगी नाहीये. त्यामुळे पुढच्या त्या 'शो'च्या ठिकाणी चालतच जावं लागतं.विविध जमातींचे नृत्यप्रकार, थाई 'किक-बॉक्सिंग'चे प्रात्यक्षिक असा तो अर्ध्या-पाऊण तासाचा शो होता. कलाकारांची वेषभूषा, केशभूषा इ. आधी कधीही पाहिलेलं नसल्यामुळे बघायला छान वाटलं. बरेचसे प्रेक्षक परदेशीच होते .... आपण तरी कुठे आपल्या देशातली आदिवासी नृत्यं वगैरे पहायला जातो? पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.
त्या शो नंतर होता The Elephant Show. सर्कसमध्ये असतात तश्या हत्तींच्या करामती, गमतीजमती होत्या. त्यामुळे विशेषतः आदित्यला खूप मजा आली. शोच्या शेवटी एका हत्तीनं त्याला आपल्या सोंडेत उचलून पण घेतलं.
ते खेळ संपल्यावर लोकांची बाहेर पडताना खूप गर्दी होते म्हणून ऍनाने आम्हाला एक भेटण्याची जागा दाखवून ठेवली होती. शिवाय तिची 'नीदी छत्ली' होतीच. मी बाहेर आले तर अजय आधीच तिथे पोचलेला होता. मला शंका आली. जवळ जाऊन त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला - त्याच्या अंगात ताप होता. मला जोरात ओरडावंसं वाटलं - 'अरेऽऽऽ! काय चाललंय काय?!! कशाला आलो आपण इथे?' घरी त्याला कधीही आजारी पडलेला मी पाहिलेला नाही. आणि इथे त्याचं हे काय झालं होतं. मला हसावं की रडावं ते कळेना!! ... मुलांच्या मदतीला आली नाही तर ती आई कसली !! सासूबाईंकडे क्रोसिन होती. ती त्यांनी अजयला दिली. त्या क्रोसिनवर हवाला ठेवून आम्ही तिथून निघालो. पट्टाया शहराबाहेरच्या एका हॉटेलमध्ये जेवण होतं. जेवायला जायचं असलं की ऍना आधी त्या हॉटेलमध्ये फ़ोन करून दुसरा कुठला भारतीय गृप तिथे जेवायला आलेला नाहीये ना ते विचारायची. कारण आम्ही जाऊ त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय हॉटेल्स होती पण लहानलहान होती आणि 'केसरी-सचिन' वगैरे सगळेजण तिथेच यायचे जेवायला आणि मग तिथे अशी गर्दी व्हायची की विचारायची सोय नाही. त्या गर्दीचा अनुभव आम्हाला अल्काझार शो नंतर आलेला होता. त्यादिवशी 'रेस्तरॉं मोकळं आहे' असं कळल्यावर तिनं आम्हाला घाई करून तिथून बाहेर काढलं आणि बस त्या दिशेने निघाली.
जय क्रोसिन!!! जेवायच्या ठिकाणी पोचेपर्यंत अजयचा ताप उतरलेला होता. तिथे जेवलो. आमचं जेवण संपतासंपता सचिन ट्रॅव्हल्सचा गृप आलाच तिथे. मग आम्ही विजयी मुद्रेने तिथून बाहेर पडलो.

'चोनबुरी राज्य महामार्गा'वरून आमची बस निघाली. बॅंकॉक आणि पट्टाया दोन्ही 'चोनबुरी' जिल्ह्यात येतात हे रस्त्यांवरच्या एकदोन इंग्रजी पाट्या वाचून कळलं. फक्त महामार्गांवरच इंग्रजी आणि थाई - दोन्ही भाषेत पाट्या होत्या. इतर सगळीकडे निरक्षराची गत होती. वाटेत 'लोटस शॉपिंग मार्केट' मध्ये थोडा वेळ थांबायचं होतं. शॉपिंग मार्केट कसलं, तो तर एक भलाथोरला मॉल वाटला मला तरी. कदाचित २-३ मजलीच होता म्हणून त्याला मॉल म्हणत नसावेत. आम्ही त्या मोठ्याच्यामोठ्या मार्केटमध्ये सर्वप्रथम काय शोधलं असेल ?? ... तर डोक्याला लावायचं तेल!!! प्रवासासाठी सामानाची बांधाबांध करत असताना दहा जणांच्या दहा सूचना रोज ऐकायला मिळत. अशीच कुठलीतरी सूचना ऐकून आम्ही सामानातली तेलाची बाटली काढून ठेवली होती. पण आम्हाला सगळ्यांनाच नियमित तेल वापरायची सवय आहे - अजय सोडून. त्यामुळे ३-४ दिवसांनी त्याच्याविना चैन पडेनासं झालं होतं. साधं तेल कुठेच दिसलं नाही. सेल्स गर्ल्सना विचारून काहीही उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही चक्क 'बेबी ऑईल' विकत घेतलं. साठी-सत्तरीच्या घरातल्या तीन, पस्तिशीच्या एका आणि ११ वर्षांच्या एका - अश्या पाच 'बेबीज'नी मग ते तेल वापरलं पुढचे ८-१० दिवस!!! आम्ही त्या मार्केटमध्ये इकडेतिकडे फिरेपर्यंत आदित्य दुसऱ्या मजल्यावरच्या काही व्हिडियोगेम्स खेळून आला. सरकते जिने आणि व्हिडियोगेम्स अशी दुहेरी मेजवानी मिळाली त्याला. थोडीफार खाद्यपदार्थांची पण खरेदी केली आणि तासाभराने तिथून निघालो. बाहेर खूप ऊन होतं. आता बॅंकॉक गाठायचं होतं.

बॅंकॉकमध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं ही नित्याचीच बाब आहे याचं सूतोवाच ऍनानं आधीच करून ठेवलं होतं आणि त्याचा प्रत्यय बॅंकॉकमध्ये शिरल्यावर लगेच आलाच. पण त्या दिवशी आम्ही बसमध्ये सर्वात पुढच्या सीटवर बसलो होतो. त्यामुळे समोरच्या काचेतून रस्त्यांवरच्या पाट्या बघण्यात, त्यांवरच्या थाई अक्षरांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात तो खोळंबा कंटाळवाणा नाही झाला.
आपला देश सोडून आता आम्हाला ३-४ दिवस झाले होते. इतक्या दिवसात बसमधून जाता-येता कुठेही शाळा किंवा शाळेला जाणारी मुलं दिसली नव्हती रस्त्यांवर. ऍनाला तसं विचारल्यावर तिनं सांगितलं की सुट्ट्यांनंतर शाळा सुरु व्हायला अजून १-२ दिवस अवकाश होता.

बॅंकॉकमध्ये भर गर्दीच्या रस्त्यावर आमचं 'फ़र्स्ट हॉटेल' होतं.

MALESIA__106.jpg

खरेदीची सर्व प्रमुख ठिकाणं जवळपासच होती. भर रस्त्यावर हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी बस उभी करायला परवानगी नव्हती. शेजारच्या एका अरुंद गल्लीत बस वळवायची होती. एक तर ती भलीथोरली 'व्हॉल्वो' बस, वळवायला जागा अगदी कमी आणि वाहता रस्ता ... पण आमच्या ड्रायव्हरनं इतक्या शिताफीनं ते सगळं केलं की मान लिया उसको. २-३ वेळा पुढेमागे करावं लागलं पण तेवढंच. मागून येणाऱ्या गाड्या तोपर्यंत शांतपणे रस्ता मिळण्याची वाट पाहत थांबल्या. कुठेही घुसवाघुसवी नाही की कर्णकर्कश्श हॉर्न्स नाहीत. खरं तर, त्यामुळेच २-३ प्रयत्नांत ती बस आत वळू शकली. तसंही, १५ दिवसांत गाड्यांचे जोरजोरात वाजणारे हॉर्न्स आम्ही कुठेही ऐकले नाहीत.
कोलंबो, पट्टायाच्या तुलनेत या हॉटेलच्या खोल्या जरा लहान होत्या. कोलंबोला आमचा पोहण्याचा बेत पावसामुळे फसला, पट्टायाला तेवढा रिकामा वेळच नव्हता मिळाला. इथे खोल्या ताब्यात मिळून सामान टाकल्यावर मात्र आदित्यनं भुणभूण सुरु केली. माझा त्या वेळी पोहण्याचा बिलकुल मानस नव्हता कारण जेमतेम तासाभरात आम्हाला जेवणासाठी बाहेर पडायचं होतं. त्यापूर्वी जरा मस्त चहा-कॉफ़ी प्यायचा आमचा विचार होता. पण आदित्यची समजूत कशी काय काढायची? शेवटी आमच्या गृपमधले एक काका पोहायला चालले होते, त्यांच्याबरोबर त्याला पाठवलं. त्या परांजपे काकांशी आदित्यची नंतर चांगलीच गट्टी जमली.
रात्री 'करी पॉट' नावाच्या भारतीय रेस्तरॉमध्ये जेवण होतं. आमच्या हॉटेलपासून ते अगदी जवळ होतं, पण गृपमध्ये आजी-आजोबा बरेच असल्याने आम्ही बसनंच गेलो तिथे. हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. कुठलातरी गुज्जू गृप होता. 'आता १५ दिवस कानावर 'आगड-पाछड' पडणार नाही' असं वाटलं होतं घरातून निघताना. पण सहलीच्या पाचव्या दिवशीच तो समज चुकीचा ठरला. गुज्जूंपासून आता आम्हाला सुटका नाही हेच खरं.
तिथे जवळच 'बिग-सी शॉपिंग मॉल' होता. जेवणानंतर त्या शॉपिंग मॉलमध्ये एक चक्कर टाकायची टूम निघाली. आमच्याबरोबर जोशी म्हणून एक कुटुंब होतं. त्यांची मुलगी पूर्वा आणि आई - दोघी मिळून एक खोली वापरायच्या. त्यामुळे त्यांच्याशी पण आमची आता चांगली ओळख झाली होती. प्रथम, मी, आदित्य, बाबा आणि ते तिघं जोशी असे जमलो. शिंदेंची परवानगी घेतली. हळुहळू इतर काहीजण सुध्दा आम्हाला येऊन मिळाले आणि शेवटी आम्ही १६-१७ जण तिथून निघालो चालत. इतर लोकांना घेऊन बस हॉटेलवर परत गेली. संध्याकाळी आदित्य जेव्हा पोहायला गेला होता तेव्हा त्या जोशींनी आसपासच्या भागात एक चक्कर मारलेली होती. त्यामुळे त्यांच्या भरवश्यावर आम्ही सगळे त्यांच्या मागेमागे निघालो होतो ... बॅंकॉकच्या पूर्णपणे अनोळखी रस्त्यांवरून आम्ही असे भटकत होतो की जणू तो डेक्कन जिमखाना असावा आणि ते सुध्दा रात्री ९.३० वाजता. 'बिग-सी' रात्री ११ वाजेपर्यंत उघडं असतं असं कळलं होतं. म्हणजे भरपूर वेळ होता. पदपथावर विक्रेत्यांची आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांची प्रचंड गर्दी होती. दादर परिसरातून फिरत असल्यासारखं वाटत होतं. फरक एवढाच की आपल्याकडे वडापाव किंवा पावभाजीच्या गाड्या असतात, तिथे केवळ मांसाहारी पदार्थांच्या होत्या. त्या गाड्यांवर जे काही शिजत होतं ना त्याची अक्षरशः शिसारी आली. तो वास अजूनही माझ्या नाकात बसलाय. हेच का ते जगप्रसिध्द 'थाई फ़ूड'?? बॅंकॉकमध्ये शक्य झालं तर कुठेतरी 'थाई फ़ूड' चाखून पहायचं मी ठरवलं होतं आधी. पण आता या असल्या वासानं त्याचा पुनर्विचार करण्याची गरज भासायला लागली होती. रस्ता पक्का माहीत नसल्यामुळे थोडा लांबचा वळसा घेऊन, अधेमधे कुणाकुणाला विचारत १० नंतर मॉलपाशी पोचलो. ८-१० मजली शॉपिंग मॉल मी प्रथमच पाहत होते. आत शिरल्यावर समोर मोठ्या फलकावर कुठल्या मजल्यावर काय आहे त्याची माहिती दिसत होती. अर्धीअधिक जागा चित्रपटगृहं आणि उपहारगृहं यांनीच व्यापलेली होती. आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तिसऱ्या मजल्यावर होत्या. 'एस्कलेटर्स ... !!!' आदित्यचे डोळे लगेच चमकले. तिसऱ्या मजल्यावर एस्कलेट झालो ...

... ११ कधी वाजले कळलंही नाही. परत चालतचालत हॉटेलवर आलो. जरा पायपीट केल्यामुळे बरं वाटलं. आमच्याबरोबर मॉलमध्ये एक आजी-आजोबा आले होते ते शिंदेंना न सांगताच! आम्हाला त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तिकडे हॉटेलमध्ये ते कुठे दिसेनात म्हटल्यावर साहजिकच सगळ्यांना काळजी वाटायला लागली होती. शिंदेंनी अंदाज बांधला की ते आमच्याबरोबर असतील. पण कळणार कसं? म्हणून, आम्ही परत आलोय की नाही ते विचारण्यासाठी त्यांनी ३-४ वेळा अजयला फ़ोन केला. अजयला वाटलं आम्हीच न सांगता गेलोय म्हणून ते सारखा फ़ोन करताहेत. तो आमच्यावर जाम भडकला. आम्ही परत आलो तेव्हा तो जोरदार भांडणाच्या पावित्र्यात होता. 'मी सांगून गेले होते' हे तो ऐकून घ्यायलाच तयार होईना. अश्यावेळी मात्र ताप-मळमळ काही आड येत नाही!!! मलाही कळेना की व्यवस्थित परवानगी घेऊनसुध्दा शिंदेंनी ३-४ वेळा चौकशी का करावी? पण रात्री ११.३० वाजता, आदित्यसमोर वाद नको म्हणून मी काही जास्त बोलले नाही. या सगळ्या प्रकाराचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी झाला.

कुठेही प्रवासाला निघायचं की नवरा-बायकोचं सामान भरताना पहिलं भांडण होतं. नंतर प्रवासातपण साध्यासाध्या कारणानं भांडणं, वादावादी होते. निघाल्यापासून आमच्यात एकही वाद झाला नव्हता - जरा आश्चर्याचीच गोष्ट होती पण कदाचित निघाल्यापासून अजयची तब्ब्येत बरी नव्हती त्यामुळे असेल ... पण, जर तसं होतं तर मग आता मला निवांत झोपायला हरकत नव्हती कारण आम्ही भांडलो याचा अर्थ आमचा नवरा ठणठणीत बरा झाला होता ...आणि याहून दुसरं काय हवं होतं !!!!!!!!!

 दाती हू मे, दल्दी हे क्या ...

आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार त्यादिवशी आमची 'बॅंकॉक सिटी टूर' होती. पण त्याऐवजी आम्ही 'सफ़ारी वर्ल्ड'ला भेट देणार होतो. तसा आमच्या दृष्टीने काही फ़रक पडत नव्हता म्हणा! आधी तिथे मजा करायची त्याऐवजी ती इथे ... शिवाय दुसऱ्या दिवशी तिथे जायचंच होतं ना!!
त्यामुळे त्यादिवशीच्या दिल्या गेलेल्या पहिल्या वेळेला उठलो, दुसऱ्या वेळेला नाश्ता केला आणि तिसऱ्या वेळेच्या आधीच बसमध्ये जाऊन बसलो.

रोज सकाळी हॉटेल वरून निघताना किंवा एकूणच कुठूनही निघताना मंडळी बसमधे चढली की ऍनाची मोजदाद सुरू व्हायची - मनातल्या मनातच. आम्ही ४९ जण आणि ती ५० वी - आकडा जुळला की ती सुटकेचा निःश्वास टाकायची. माझी फार इच्छा होती की एकदा तरी तिला मोठया आवाजात मोजायला सांगायचं. १ ते ५० ला थाई भाषेत काय म्हणतात ते तरी कळलं असतं.
आमच्या गृपमध्ये बरेच गायक होते - हौशी पण, रीतसर शिकलेले पण. बस निघाली की रोज कुणीतरी एखादं स्तोत्र किंवा श्लोक असं काहीतरी म्हणायचं. ते झालं की मग इतर काहीजण भावगीत, भजन, अभंग म्हणायचे. मी ऍनाला ती पण विनंती करून पाहिली. तिला म्हटलं - बाकी काही नाही तर निदान थायलंडचं राष्ट्रगीत तरी म्हण. त्यामागे केवळ 'एक वेगळी भाषा ऐकणे' हाच उद्देश्य होता. पण तिने नकार दिला. (नंतर वाटलं - तिनं नाही म्हटलं तेच बरं झालं. त्या राष्ट्रगीताला बस मध्येच उभे राहून सर्वांनी मान दिला असता का?)
सहज गप्पा मारता-मारता तिनं सांगितलं की तिला २ हिंदी गाणी माहीत होती - 'तू चीज़ बडी है मस्त मस्त' आणि 'जाती हूँ मैं, जल्दी है क्या' आणि ते कसं - 'तू तीद बदी हे मत्त मत्त' आणि 'दाती हू मे दल्दी हे क्या'!!! काही वर्षांपूर्वी अश्याच कुठल्यातरी भारतीय गृपमधल्या एका लहान मुलीनं तिला ती शिकवली होती. तिच्या तोंडून त्या ओळी ऐकायला फार मजा यायची.
तो संपूर्ण दिवस आम्ही सफ़ारी वर्ल्ड मध्येच घालवणार होतो. त्या दिवशी विशेषकरून आदित्यच्या आकर्षणाच्या जास्त गोष्टी पहायच्या होत्या. सर्वात पहिलं आकर्षण होतं - सफ़ारी ड्राईव्ह. नैसर्गिक वातावरणात वावरणारे जंगली प्राणी आम्ही बंद गाडीत बसून पाहिले. त्या वनातल्या छोट्या रस्त्यावरून १०-१५ च्या वेगाने बस चालवत ड्रायव्हरने आम्हाला सगळीकडे फिरवून आणले. आपल्याला प्राणी नेहेमीच पिंजऱ्यात पहायची सवय, त्यामुळे तो अनुभव खरंच छान होता. वाघ-सिंह आठ-आठ, दहा-दहाच्या कळपानं बसलेले होते. तेव्हा ती त्यांची न्याहारीची वेळ होती. थोड्याच वेळात त्यांच्या रोजच्या परिचयाची एक 'ट्रेलर व्हॅन' तिथे आली. त्या ट्रेलरवर एका बंदिस्त पिंजऱ्यात एक विशीची मुलगी उभी होती. तिच्या शेजारीच एका मोठ्या बादलीत मांसाचे मोठे-मोठे तुकडे ठेवलेले होते. पिंजऱ्यातून ती नुसता एक तुकडा बाहेर काढायची की एखादा सिंह झडप घालून तो पकडायचा. बघता-बघता ७-८ सिंह चहूबाजूंनी त्या पिंजऱ्यावर चढले.

MALESIA__085.jpg

'सगळ्यांना मिळणार आहे, घाई करू नका' अश्या थाटात ती त्या हिंस्त्र श्वापदांना शांतपणे भरवत होती. आम्ही बंद बसमध्ये बसलेलो असूनसुध्दा ते पाहून अंगावर अक्षरश: काटा आला.
अर्ध्या तासाच्या त्या फेरीत जिराफ, झेब्रा, एमू पक्षी यांसारख्या आपल्याकडे न दिसणाऱ्या मंडळींनी जास्त लक्ष वेधून घेतले आणि तेवढ्या वेळातच आदित्य तुडुंब खूष झालेला होता.

त्यानंतर, प्राण्यांचे काही खेळ पहायचे होते - 'द सी-लायन शो' आणि 'द डॉल्फिन शो'. आदल्या दिवशी 'नॉंग-नूच व्हिलेज' मध्ये आणि त्यादिवशी तिथेपण आत शिरल्यावर सगळ्यांच्या कपड्यांवर एक-एक छोटा प्रवेश-परवाना चिकटवला गेला. एकाच तिकीटावर अनेक गोष्टी पहायच्या असतील तेव्हा तिथे ही पद्धत पहायला मिळाली. याच्यामुळे खूपच वेळ वाचायचा. एक म्हणजे - दिवसभर तिकीट सांभाळून ठेवायची कटकट नाही आणि प्रत्येकवेळी प्रवेशद्वारापाशी तिकीट दाखवा, परत घ्या ही भानगड नाही.
प्रत्येक शो पाऊण तासाचा आणि मध्ये एक-एक तासाचा वेळ. त्या मधल्या वेळात एका प्रेक्षागृहापासून पासून दुसऱ्या प्रेक्षागृहापर्यंत चालत जायचं. 'या चालत जायच्या वेळेला उन्हाचा थोडा त्रास होईल' असं ऍनाने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो - म्हणजे टोप्या, रूमाल, गॉगल, पाण्याच्या भरपूर बाटल्या ... पण तसा विशेष त्रास झाला नाही .... (उलट त्या बाटल्यांचं ओझंच झालं जास्त. पण त्याची चिंता नव्हती कारण आता ते वजन उचलायला आमचा खंदा वीर एकदम 'फ़िट ऍन्ड फ़ाईन' होता !!!)
तो रस्ता झाडांनी आणि हिरवाईने इतका नटलेला होता की आजूबाजूला पाहूनच गाऽऽर वाटायचं. वाटेत पक्ष्यांचे मोठे-मोठे पिंजरे होते. असंख्य रंगांचे आणि आकाराचे पक्षी त्यांत होते. प्रत्येक पिंजऱ्याच्या डोक्यावर पाण्याचा छोटासा फवारा उडत होता. पक्षी वाटेल तितक्या वेळेला ते पाणी प्यायचे, त्यात आंघोळ करायचे. कुठेही घाण नव्हती की अश्याठिकाणी जो एक विशिष्ट डोक्यात जाणारा वास असतो तो नव्हता. मग कसला त्रास आणि काय!! ते सगळे खेळ पाहताना आदित्यला जितकी मजा आली तितकीच मजा मला त्या पायवाटांवरून चालताना आली.
पहिला शो होता - 'द सी लायन शो'. तीन-चारशे माणसं बसू शकतील असं एक अर्धवर्तुळाकार छोटं खुलं प्रेक्षागृह आणि समोर रंगमंच. तिथेसुध्दा अर्ध्या भागात मोठा पाण्याचा तलाव होता. सी-लायन हा प्राणी त्याआधी केवळ टी.व्ही. वरच पाहिलेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पहायला मजा आली.

4043-08.jpg

खेळ करवून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कमरेला सी-लायनच्या खाद्याची एक पिशवी लटकवलेली होती. एखादी करामत दाखवून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच सगळे सी-लायन्स त्या माणसांजवळ 'आ' करून उभे रहायचे. मग ती माणसं त्यातलं खाद्य त्यांना भरवायची. हे म्हणजे 'गाणं म्हणून दाखव, मग बिस्कीट देणारे हं' अश्यातलाच प्रकार होता. पण एकंदर शो मस्त होता. तमाम बच्चेकंपनी उड्या मारत होती, खुषीने टाळ्या पिटत होती.
त्यानंतर होता - 'द डॉल्फिन शो'. स्वरूप साधारण तसंच; ती 'गाणं म्हटलं तरच बिस्किट' ची अट पण तशीच. डॉल्फिन हा प्राणी पण आधी कधी प्रत्यक्ष पाहिलेला नसल्यामुळे मजा आली.
त्यानंतर होता - 'द काऊबॉय स्टंट शो'. रंगमंचाच्या जागी एखाद्या काऊबॉयच्या सिनेमात शोभेल असा सेट उभा केलेला होता. काऊबॉयच्या वेषातले कलाकार 'स्टंट' च्या नावाखाली एकमेकांना नुसते धोपटत होते. हा शो मात्र खरंच 'केवळ लहान मुलांसाठी' होता. कारण मला तरी ५ मिनिटांतच त्या हाणामारीचा कंटाळा आला. आदित्यचा खिदळणारा चेहेरा त्यापेक्षा जास्त प्रेक्षणीय होता. हा शो संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली.

एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. तिथे एकाच वेळी हजार-दीड हजार माणसं जेवू शकत होती. तो आकडा आणि तिथली प्रत्यक्ष गर्दी पाहून जेवणाचं जे चित्रं डोळ्यासमोर आलं त्याच्या एकदम उलटं दृश्य तिथे होतं. अतिशय उत्तम व्यवस्था, कुठेही गडबड-गोंधळ नाही; खोळंबलेली, जागेअभावी उभ्याने जेवणारी माणसं नाहीत की काही नाही.

MALESIA__095.jpg

तिथे थाई, जपानी, चिनी पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स होते. आधी व्यवस्थित पोट भरून जेवल्यावर मग मी त्या दिशेला मोहरा वळवला. चिनी पदार्थांचं विशेष आकर्षण नव्हतं, जपानी पदार्थांचा कसातरीच वास येत होता आणि नावावरून काय पदार्थ आहे ते पण कळत नव्हतं. राहता राहिले थाई पदार्थ .... त्यातल्यात्यात दोन पदार्थ जरा बरे वाटले म्हणून चाखून पहायचं ठरवलं. नावं आता विसरले - त्यातला एक छान होता चवीला पण दुसरा जो खाल्ला त्याची चव मात्र 'अशक्य भयंकर' होती. तो तोंडात घातल्याक्षणी माझा इतका विचित्र चेहेरा झाला की मी लगेच चपापून आपल्याकडे आपल्या गृपमधलं कुणी पाहत नाहीये ना याची खात्री करून घेतली. तर माझी ती फजिती नेमकी आईनंच पाहिली होती!!! आता पुन्हा म्हणून असल्या कुठल्याही पदार्थांच्या वाटेला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं.

जेवणानंतर होता चौथा शो - 'द स्पाय वॉर शो'. जेम्स बॉन्डच्या सिनेमातला एक सेट उभा केलेला होता. पाऊण तासात वेगवेगळे स्पेश्यल इफ़ेक्ट्स आणि निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक करामती वापरून एक जेम्स बॉन्डची गोष्टच सादर केली गेली. अगदी रोप-वे वरची साहसदृष्यं आणि मिसाईल्सचा स्फोट सुध्दा!!! हा शो मात्र त्यातल्या नाविन्यामुळे मला आवडला.

चार खेळ आणि सोबतची भटकंती यांत दिवस कसा संपला ते कळलंही नाही. परतायची वेळ झाली. ऍनाचं 'तला-तला' कानावर पडलं आणि आम्ही बसच्या दिशेनं चालायला सुरूवात केली.
परतताना एका मोठ्या 'ड्यूटी-फ़्री शॉप' ला भेट द्यायची होती. (शुध्द मराठीत - एक अत्यंत महागडं दुकान !!) 'विंडो शॉपिंग' ला पैसे पडत नाहीत ते बरंय! तिथे तासभर वेळ घालवला. थाई चॉकोलेट्स विकत घेतली. बाहेर पडता-पडता कुठूनतरी कॉफ़ीचा वास दरवळत आला. नकळत पावलं तिकडे वळली. मी आणि अजय तिथली ८०-८० बाथ ची कॉफ़ी प्यायलो. आपल्या देशात 'एका कपाला ८० रुपये घेतात' म्हणून मी 'बरिस्ता कॉफ़ी' ला नेहेमी नावं ठेवते याचा मला तिथे चक्क विसर पडला!!

सात-साडेसातला हॉटेलवर परत आलो. जेवायला पुन्हा (ऍनाच्या भाषेत) 'कली पॉत' ला जायचं होतं. थाई भाषेत लहानग्यांचे बोबडे बोल आणि मोठ्यांचे साधे बोल असा फरकच नसावा बहुतेक!

थायलंडमधला चौथा दिवस संपत आला होता. 'चार दिवस झाले या देशात येऊन ??' खरं वाटेना ... तसंही, स्वप्नवतच चाललेलं होतं सगळं म्हणा!!!

 द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.

रोज आम्ही तयार व्हायच्या आत ऍना हजर असायची. त्यादिवशी मात्र सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तरी तिचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात तिचा फ़ोन आला की तिच्या यायच्या रस्त्यावर एक अपघात झाला होता आणि ती रहदारीत अडकली होती. मग काय, आमच्याजवळ वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण एव्हाना सगळ्यांच्या एकमेकांशी अर्धा-पाऊण तास गप्पा मारण्याइतपत ओळखी झालेल्या होत्या. कुणी 'फ़ोटो सेशन्स' सुरू केली, कुणी गटागटाने गप्पा मारत बसले.
ऍना पोचली तोपर्यंत १० वाजून गेले होते. लगेच आम्ही निघालोच. आज आम्ही सगळेजण 'भगवान बुध्द के सामने मत्था टेकने' जाणार होतो!! आम्हाला मिळालेल्या 'डे टू डे' कार्यक्रमानुसार आजच्या 'बॅंकॉक सिटी टूर' मध्ये बुध्दाची देवळंच जास्त होती. 'देऊळ' म्हटलं की माझा अर्धा उत्साह संपलेला असतो. पण त्यादिवशी ठरवलं की 'देवळात जायचंय' असं मनात न आणता 'एका वेगळ्या शैलीचं बांधकाम पहायला जातोय' असं म्हणून जायचं. आणि खरंच, त्या देवळांची रचना वगैरे सगळंच वेगळं होतं.

त्यादिवशी माझी आणि अजयची जागा व्हॅनमध्ये होती. ती छोटी असल्यामुळे बसच्या बरीच पुढे निघून आली. बस मात्र रहदारीत अडकली. मग आम्ही बसची वाट पाहत एके ठिकाणी थोडावेळ थांबलो. तो बॅंकॉकच्या मुख्य रस्त्यांपैकी एक असावा.आठ पदरी वाहतूक सुरू होती. दुतर्फा झाडं लावलेली होती. चौकात राजा-राणीचं मोठ्ठं चित्रं लावलेलं होतं. (अशी राजा-राणीची चित्रं बॅंकॉकमध्ये ठिकठिकाणी दिसली.) संपूर्ण रस्ताभर पिवळे झेंडे फडकत होते. त्या पिवळ्या रंगाचं एक कारण होतं. यंदा थायलंडचा राजा आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. राजा-राणी वर थाई लोकांचं भारी प्रेम. त्याच्या सन्मानार्थ अनेकजणांच्या अंगातपण पिवळे कपडे होते. रस्त्याच्या डाव्याबाजूला भल्या-थोरल्या परिसरात राजवाडा पसरलेला होता. ड्राइव्हरनं सांगितलं की कुठलेही शाही सोहोळे, मिरवणूका, परदेशी पाहुण्यांचं स्वागत हे सगळं त्या परिसरात, त्या रस्त्यावर होतं. काही दिवसांपूर्वी थाई पंतप्रधान परदेशात असताना याच राजाने लष्कराला उठावात मदत केली होती.
'उठाव ...!!' खरंच की .... मी विसरूनच गेले होते!! आम्ही निघायच्याआधी ८-१५ दिवस हा उठाव झाला होता. इतर वेळेला त्या बातमीकडे मी लक्षंही दिलं नसतं फारसं, पण तेव्हा मात्र मी २-३ दिवस बेचैन झाले होते हे मला आठवलं. त्यासंबंधी नंतर आठवडाभर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यासुध्दा मी इतक्या लक्षपूर्वक वाचल्या होत्या की जितक्या त्या परदेशात असलेल्या त्यांच्या पंतप्रधानांनी पण वाचल्या नसतील. 'बॅंकॉक-पट्टाया रद्द करावं लागतंय बहुतेक' इथपर्यंत माझी विचारांची गाडी येऊन पोचली होती तेव्हा - तोच हा राजा काय!! मी चित्रातल्या राजाच्या चेहेऱ्याकडे पुन्हा नीट पाहिलं. ७५व्या वर्षी असलं काही करण्यासाठी अंगात हिम्मत पाहिजे!!

बस दिसल्यावर आम्ही पुन्हा निघालो. ५-१० मिनिटांत एका प्रवेशद्वारापाशी आमच्या गाड्या थांबल्या. ते ३-४ देवळांचं बनलेलं असं एक संकुल होतं. प्रथम आम्ही गेलो 'द रिक्लायनिंग बुध्द' पहायला. दारात चपला काढल्या. (चपला काढल्यावर मात्र खरंच देवळात आल्यासारखं वाटलं!) आत एक ४५ मि. लांब, १४-१५ मि. उंच अशी बुध्दाची उजव्या कुशीवर पहुडलेली प्रचंड मूर्ती होती. तिची भव्यता आपल्या श्रवणबेळगोळच्या बाहुबलीच्या भव्यतेशी नातं सांगणारी होती. त्या बुध्दाच्या डोक्याखालच्या उशीची उंचीच ८-१० फ़ूट होती. कुठल्याही प्रकारे ती आख्खी मूर्ति कॅमेऱ्यात मावेना. भिंतींवर चित्ररूपी कथा रंगवलेल्या होत्या - थाई पुराणातल्या असाव्यात बहुतेक. तिथून बाहेर पडलो.

समोरच 'द गोल्डन बुध्द' होता.

4042-03.jpg

साडे-पाच टन शुध्द सोन्यात घडवलेली मूर्ती - बाप रे! इतकं असूनही कुठेही सुरक्षा-व्यवस्था वगैरेचा मागमूसही नव्हता. 'थायलंड-ब्रह्मदेश लढाईत टिकून राहिलेलं ते एकमेव देऊळ आहे' अशी माहिती कळली. थायलंड-ब्रह्मदेश यांच्यात विळ्या-भोपळ्याचं सख्यं आहे भारत-पाकिस्तान सारखं. ही माहिती मात्र मला नवीन होती. ब्रह्मदेशने लढाईत सगळी देवळं नष्ट करायला सुरूवात केल्यावर त्या देवळातल्या बुध्दाच्या मुख्य मूर्तीवर सिमेंटचा थर चढवण्यात आला आणि त्यासारख्याच अजून काही नुसत्या सिमेंटच्या मूर्ती बनवण्यात आल्या. त्यामुळे हल्लेखोरांना खरी मूर्ती कुठली ते कळलं नाही आणि ते तसेच तिथून निघून गेले..... थायलंडमध्येही देवळात गेल्यावर लोक उदबत्या लावतात, गुडघ्यावर बसून मनोभावे नमस्कार करतात हे तिथे कळलं. पु.लं.चं एक वाक्य आठवलं - देश, धर्म, जात, प्रांत कुठलाही असो, त्या सर्वशक्तीमान परमेश्वरापुढे झुकताना प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर लीनतेचे एकच भाव असतात.

प्रत्यक्ष मूर्ती किंवा नमस्कार यापेक्षा मला साहजिकच देवळाचा परिसर, वास्तुशैली इ.त जास्त रस होता. परिसर अतिशय स्वच्छ होता. बुध्द धर्मातल्या प्रत्येक महापुरुषाचं एक-एक स्मारक उभं केलेलं होतं. कळसांची रचना, आकार, त्यावरचं कोरीव काम खूपच वेगळं आणि सुंदर होतं;

4042-05.jpg

मुख्य म्हणजे 'नवीन काहीतरी पाहिलं' हा आनंद देणारं होतं.

१२ वाजत आले होते. देवळाच्या बाहेर पडलो तर बाहेर एक शहाळंवाला दिसला. जवळ पाण्याच्या बाटल्या असूनही साहजिकच आदित्यला त्याची तहान लागली. पण त्यामुळे त्या माणसाला फायदाच झाला. कारण, आदित्यने घेतल्यावर आमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्याकडून शहाळी घेतली. तो नारळ पसरट गोल आकाराचा, मोठा आणि बाहेरून पण पांढऱ्या रंगाचा होता. पण निसर्गाची काय कमाल आहे - हजारो कि.मि. अंतर पार केल्यावर नारळाचं बाह्य रूप बदललं पण आतल्या पाण्याची चव मात्र तशीच मधूर, ताजंतवानं करणारी!!!

तिथून निघालो. अजून एका बुध्दाच्या देवळाला भेट दिली. हे देऊळ मात्र थोडं आपल्या देवळांसारखं होतं - म्हणजे दगडी पायऱ्या, बाहेर दुकानं वगैरे.
जेवायची वेळ होत आली होती. पोटात कावळे 'करी पॉट,करी पॉट' असं ओरडायला लागले होते. परतताना आमची व्हॅन कुठल्या-कुठल्या गल्ली-बोळातून आली. तो संपूर्ण भाग पुण्यातल्या रविवार पेठेसारखा होता. फक्त रविवार पेठेत मिनी स्कर्टमधल्या पोरी दिसत नाहीत, इथे होत्या. इतकाच काय तो फरक!!

जेवणानंतरचा वेळ मोकळा होता - खरेदी इ. साठी. दोन्ही आज्ज्यांना 'बिग सी' ला जायचं होतं. पण मोकळा वेळ म्हटल्यावर आदित्यला लगेच स्विमिंग आठवलं. मग त्याची रडारड आणि शेवटी तह - आदल्या दिवशी आजोबांनी मॉल पाहिला होता म्हणून ते आदित्यसाठी हॉटेलवरच थांबले आणि पाचच्या सुमाराला आम्ही चौघं निघालो. रस्ता अगदीच सोपा होता. आदल्या रात्री आम्ही बराच मोठा वळसा घालून गेलो होतो असं लक्षात आलं. तरीही जाताना रस्त्यातल्या खाणाखुणा लक्षात ठेवत चाललो होतो. वाटेत चार पादचारी पूल लागले. 'चार पुलांनंतर डावीकडे वळायचे' अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि मॉलमध्ये शिरलो. थोडी-फार खरेदी केली.
'४०-५० बाथ मध्ये टुकटुकनं हॉटेलवर परत येता ये‍ईल' असं सौ.शिंदेनी सांगितलं होतं. थायलंडमधली टुकटुक म्हणजे आपल्या सहा आसनी रिक्षाच्या आकाराची तीन आसनी रिक्षा! म्हटलं - चला, टुकटुक तर टुकटुक. तर तो टुकटुकवाला परदेशी लोक पाहिल्यावर अव्वाच्या सव्वा भाडं सांगायला लागला. बरं, 'आम्ही रोज जातो, ४० बाथच होतात' असं म्हणायची पण सोय नव्हती!! शेवटी गुपचुप चालतच निघालो. अपेक्षेप्रमाणे, '३ पुलांनंतर वळायचं की ४?', 'हा गेला तो दुसरा की तिसरा?' असे सगळे वाद पार पडले. नाहीतरी, त्यादिवशीचा आमचा वादावादीचा कोटा पूर्ण व्हायचाच होता.
हॉटेलवर पोचलो तर पाण्यात यथेच्छ डुंबून आदित्य आमची वाटच पाहत बसला होता.
रात्री जेवण हॉटेलच्याच डायनिंग-रूममध्ये होतं. तिथे एका कोपऱ्यात एक माणूस मोठ्ठ्या पियानोवर कुठलंतरी इंग्रजी गाणं म्हणत बसला होता. त्याच माइकवर आमच्या गृपपैकी एका काकांनी एक मराठी गाणं म्हटलं. त्यांनी त्या माणसाला गाण्याची पट्टी वगैरे काहीतरी सांगितलं असावं. कारण त्याने त्या गाण्याला पियानोवर बऱ्यापैकी साथ दिली. इतका मोठा पियानो मी प्रथमच पाहत होते. एकदम झकास होता!! मग जवळ जाऊन थोडावेळ तो वाजणारा पियानो निरखत उभी राहिले.

..... तो 'झकास' पियानो आमचं सामान आवरणार नव्हता रूमवर जाऊन. त्यामुळे नाइलाजास्तव तिथून निघावं लागलं. रात्री बॅग आवरली. विमानप्रवास म्हणून एक-एक कपड्यांचा जोड पुन्हा हॅन्डबॅगेत ठेवला. कारण, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 'जीवन में एक बार जाना था सिंगापूर ...'

त्यात, थायलंडला टाटा करून निघण्यापूर्वी विमानतळावर एक 'अनपेक्षित गोष्ट' घडणार होती ....

वलयांकित शहरात प्रवेश ...

विमान-प्रवास असूनसुध्दा त्यादिवशी सकाळी फारसं लवकर उठायचं नव्हतं. ११ वाजता 'चेक-आऊट' होतं. सगळं आवरून 'डिस्कव्हरी' वरचा एक कार्यक्रम पण पाहून झाला तरी निघायला अजून अवकाश होता. मग खोलीतून बाहेर आले.
आमच्या मजल्यावर एका बाजूला एक छोटीशी गच्ची होती जिचं दार त्यादिवशी उघडं दिसलं. आमच्या खोलीच्या खिडकीतून समोर अजून एक ठोकळा इमारतच दिसायची. म्हटलं बघू त्या गच्चीत जाऊन काय दिसतंय ते .... तर डावीकडे एक वाहता रस्ता आणि उजवीकडे 'बयोके स्काय' हे बॅंकॉकमधलं सर्वात उंच ८०-९० मजली हॉटेल - असं एकदम मस्त दृश्य दिसलं.

4042-09.jpg

त्याच बयोके स्कायच्या पायथ्याशी 'करी पॉट' होतं. रोज तिथे जेवायला गेलो की एकदातरी मी मान वर करून जे उंच हॉटेल वऽऽरपर्यंत बघायचा प्रयत्न करायचे तेच हे. अध्ये-मध्ये इतर कुठ्ल्याही इमारतीचा व्यत्ययही नव्हता. पण, जरा फ़ोटो काढेपर्यंत 'बस आली' असं कळलं....१-२ दिवस आधीच तिकडे लक्ष गेलं असतं तर काही बिघडलं असतं का?? पण काही गोष्टींची चुटपूट ही लागलीच पाहिजे ना! प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली तर कसं चालेल!!!

'फ़र्स्ट होटेल' ला टा-टा करून निघालो. सुदैवाने फारशी रहदारी नव्हती. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात विमानतळावर पोचलो. आधीच त्या विमानतळाच्या मी प्रेमात पडलेली होते. त्यात त्यादिवशी तिथलं 'डिपार्चर लाऊंज' पाहून तर अजूनच प्रभावित झाले. 'ए ते जे' अश्या १० ओळी आणि प्रत्येक ओळीत १५ ते २० काऊंटर्स होते. त्यापैकी 'जी - १०,११,१२' या काऊंटर्सवर 'फ़्लाईट नं. एल एक्स १८२' ही अपेक्षित अक्षरं झळकताना दिसली. सामान 'चेक-इन' साठी उभे राहिलो. आजी-आजोबांनी बसायला जागा शोधली. कारण आता तिथेच किमान तास-दीड तास तरी जाणार होता. शिवाय एक अनपेक्षित गोंधळ होणार होता ...
इतरांबरोबरच आमचे ५ जणांचे बोर्डिंग पासेस मिळाले पण सासूबाईंचा नाही मिळाला. म्हटलं - झाला असेल पुढे-मागे, मिळेल पण नाहीच मिळाला ... मग गेला कुठे? काहीतरी गोंधळ नक्कीच होता. 'श्रीलंकन' कडून तिथे आलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्या एका तिकिटाचा व्हाऊचर नं. जुळत नव्हता .... पण त्यामुळे बोर्डिंग पास आम्हाला ताब्यात मिळेना आणि तो ताब्यात मिळाल्याशिवाय पुढे 'सिक्युरिटी चेक' ला जाता ये‍ईना. आमच्याजवळची तिकिटं दाखवूनसुध्दा काही उपयोग होईना. मग त्या ऑपरेटरने 'श्रीलंकन' ला फ़ोन केला. तो लागेना. फ़ॅक्स पाठवला आणि 'उत्तर मिळेपर्यंत मी काही करू शकत नाही' असं सांगितलं. इकडे आमचे इतर सगळे सहप्रवासी पुढे निघून गेले आणि काऊंटरपाशी आम्ही सहाजण आणि शिंदे पति-पत्नी असेच उरलो. आदित्यनं आजीला चिडवायला सुरुवात केली - 'तू रहा इथेच, आम्ही जातो सिंगापूरला' म्हणून!!!
ऍनाची आणि शिंदेंची धावपळ सुरु झाली. आमच्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे शांतपणे बघत उभे राहिलो... करणार काय दुसरं?? दरम्यान मध्येच ऍना कुठेतरी गायब झाली, ती उगवली एकदम २०-२५ मिनिटांनी. तिने 'श्रीलंकन' च्या ऑफ़िसमधल्या एकीला पकडून आणलं होतं सोबत. मग त्या काऊंटरपाशी भारतीय इंग्रजी, थाई इंग्रजी आणि सिंहली इंग्रजी अशी थोडा वेळ खिचडी झाली, हातवारे झाले आणि शेवटी 'विमानातली जागा निश्चित राहील पण नवीन तिकिट खरेदी करावं लागेल' असं कळलं. अर्थात ती जबाबदारी शिंदेंची होती. त्यांनी चार-साडेचार हजार बाथ भरून एक नवीन तिकिट घेतलं. आधीच्या तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी सहल संपल्यावर त्यांना धावपळ करावी लागणार होती ती वेगळीच. तरी त्यांच्या मते हा गोंधळ थोडक्यात निस्तरला होता आणि तो ही केवळ ऍनामुळे. तिचे आभार मानले, टा-टा केलं. आम्ही आपापसात 'तला-तला' करेपर्यंत ती दिसेनाशीही झालेली होती. 'यथा काष्ठं च ...' या उक्तीनुसार दुसऱ्या दिवशी येणाऱ्या अजून एखाद्या गृपचं ती पुन्हा तसंच स्वागत करणार होती ...

विमान सुटायला अजून अर्धा-पाऊण तास अवकाश होता. 'चार तास आधी चेक-इन'चा आम्हाला असा फायदा झाला होता. शिवाय गृपबरोबर आल्याचाही फायदा होता!! आमचं आम्ही स्वतंत्रपणे आलो असतो आणि असा काही गोंधळ झाला असता तर आम्ही काय करणार होतो कोण जाणे!!!
सिक्युरिटीतून पुढे सरकलो, बोर्डिंग गेट तिथून कुठल्या-कुठे लांब होतं. चालत जायला १५-२० मि. लागली. या सगळ्या गोंधळामुळे विमानतळावरची दुकानं वगैरे मात्र पाहता आली नाहीत. खरं तर तो सगळा भाग पाहण्यासारखा होता. तरा-तरा चालत बोर्डिंग गेटपाशी पोचलो, जरा ५-१० मि. खुर्चीत विसावतोय तोपर्यंत निघायची वेळ झाली......

त्यादिवशीचं आमचं विमान होतं 'स्विस एअर' चं. गोऱ्या कातडीबद्दल आपल्या मनात कायम एक आकर्षण असतं. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा 'अरे वा! आज स्विस एअर ने जायचंय!' अशी उगीचच एक उत्सुकता होती. खरं तर त्यात विशेष असं काहीही नव्हतं पण तरी.
विमानात प्रवेश केला तोच 'बिज़िनेस क्लास' मध्ये. त्याक्षणी लक्षात नाही आलं ते; उलट रुंद, ऐसपैस सीट्स पाहून मी खूष झाले थोडा वेळ. स्विस एअरचं मनातल्या मनात गुणगान करायला सुरुवात केली. कारण १-२ प्रवासातच इकॉनॉमी क्लासला मी वैतागले होते. विमानप्रवासाचं आकर्षण कुठल्याकुठे गायब झालेलं होतं.
पण हा माझा सगळा आनंद क्षणभंगूर ठरला - ठरणारच होता ... इकॉनॉमी क्लास नामक काडेपेटीत पुढचे तीन-साडेतीन तास बसायचं होतं. ते तसं दिवस-दिवस बसून युरोप-अमेरिकेचा प्रवास करणारे खरंच महान!!
आपापल्या जागांवर बसलो. कधी एकदा समोरचा रिमोट हातात घेतोय आणि त्यावरची बटणं दाबायला सुरूवात करतोय असं आदित्यला झालं होतं. या वेळी सहाजणांत मिळून एकच खिडकीची सीट मिळाली होती ती पण पुन्हा एकदा पंखाजवळची. केवळ व्हिडियो-गेम्स होत्या म्हणून नाहीतर आदित्यने मला एकदाही खिडकीत बसू दिलं नसतं.
ठरलेल्या वेळेला विमान हवेत झेपावलं. 'स्विस' मुळे हवाई-सुंदरींचे गणवेष वगैरे पाहण्यासारखे होते - दोनदा 'श्रीलंकन' च्या साड्या पाहिल्यावर तेवढंच जरा काहीतरी नाविन्य!! जरा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र भुकेची जाणीव झाली. थोड्या वेळाने जेवण आलं. 'स्विस' चं नाविन्य झालं, आता 'स्विस धक्क्या'ची पाळी होती. भाताबरोबर दाट, अळणी कढीसारखं काहीतरी होतं - त्यात एक मोठ्ठं, लांबलचक हिरवं पान होतं आणि आणखीनही कसल्या-कसल्या भाज्यांचे तुकडे होते. ते काय होतं ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये पण ४-५ दिवस मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर ते सौम्य जेवण मला स्वतःलातरी बरं वाटलं. मी त्या कढीबरोबर भात खाल्ला आणि मग भाज्यांचे तुकडे मीठ-मिरपूड घालून खाल्ले. विमानात कडकडून भूक लागल्यावर फारसा विचार करायचा नसतो, समोर ये‍ईल ते पोटात ढकलायचं, बास!!

..... खिडकीतून सिंगापूर जवळ आल्याच्या खुणा दिसायला लागल्या. 'चांगी एअरपोर्ट' अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. म्हणजे अक्षरशः बीचवरच धावपट्टी आहे असं म्हटलं तरी चालेल. समुद्र संपून सिंगापूरचा भूभाग दिसायला लागे-लागेपर्यंत विमान उतरतं सुध्दा. पाण्याच्या इतक्या जवळ विमानतळ का बांधावासा वाटला असेल? कसा बांधला असेल? कदाचित समुद्रात भर घालून? मग पर्यावरणवाद्यांनी तिथेसुध्दा त्याच्याविरुध्द आवाज उठवला असेल का? कारण तिथे इतरत्र तरी निदान पर्यावरणाची विशेष काळजी घेतलेली दिसली.

नव्या विमानतळावर पाय ठेवले की पहिलं काम काय तर आपापल्या घड्याळांतली वेळ बदलायची. आम्ही उतरलो तेव्हा तिथला दिवस मावळत आला होता. संध्याकाळचे ७ वाजत होते. कुठ्ल्याही विमानतळाची दिवसा आणि रात्री अशी दोन वेगवेगळी रूपं दिसतात. दिवसा तो जास्त भव्य वाटतो आणि रात्री जास्त आकर्षक!! बॅंकॉकचा विमानतळ आम्हाला रात्रीचा पहायलाच नाही मिळाला आणि सिंगापूरचा मात्र फक्त रात्रीचाच पाहिला.

4042-14.jpg

पुन्हा एकदा इमिग्रेशनच्या दिशेने 'कदम कदम बढाए जा ...' सुरु झालं. पण त्यादिवशी जास्त कदम बढवावे लागले नाहीत. कारण एकापुढे एक ५-६ सरकते पट्टे, त्याच्यापुढे सरकते जिने आणि थोड्याच वेळात आम्ही इमिग्रेशनपाशी पोचलो सुध्दा !! मुळात हे सरकते पट्टे, जिने - हे सगळं बनलं असणार कुणाचा खोळंबा न होता पटापट कामं व्हावीत म्हणून, जड सामान घेऊन जाण्याऱ्या लोकांना सोयीचं जावं म्हणून ... पण त्यामुळे माणसं जास्त आळशी बनलीयेत. जड सामान-बिमान काही जवळ नसणारे सुध्दा सरकता जिना दिसला की साध्या जिन्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत!! आदित्य तर मागून आजी-आजोबा हळूहळू ये‍ईपर्यंत त्या सरकत्या जिन्यांवरून नुसता वर-खाली करत बसायचा!!
कुठल्या काउंटरपाशी काय करायचं, कुठे पासपोर्ट दाखवायचा, कुठे बिलकुल बाहेरही काढायचा नाही इ. गोष्टींत मंडळी आता एकदम सराईत झालेली होती. त्यामुळे शिंदेंच्या सूचना आपसूकच कमी झाल्या होत्या, कामंही पटापट होत होती.

पाऊण-एक तासात बाहेर पडलो. बाहेरची हवा पुन्हा एकदा तशीच - दमट आणि ऊष्ण, वापीची आठवण करून देणारी. पण अजून किमान एक आठवडा तरी वापीची आठवण काढायची नव्हती ...
आमची बस उभीच होती. आम्ही ४९ जण, बसचा ड्राइव्हर आणि आमची तिथली गाईड - यांच्याव्यतिरिक्त तिथे चिटपाखरूही नव्हतं. अरेच्च्या! आत्ताच काही वेळापूर्वी इथे २-३ विमानं उतरली होती ना? मग बिलकुल गर्दी कशी नाही?? बाहेर पडायला अनेक दरवाजे होते की काय? पण अनेक म्हणजे तरी एवढे की बाहेर पडलेली इतर माणसं दृष्टीसही पडू नयेत!!! पण एकंदरच, पुढच्या २-३ दिवसांत तिथे 'सर्वात जास्त गर्दी' अशी जी पाहिली त्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं आपल्याकडे रविवारी दुपारी दादर लोकलच्या एका डब्यात असतात!!
बसबरोबरच्या एका व्हॅन मध्ये सगळं सामान चढलं आणि सामानबरोबरची सगळी माणसं त्या बसमध्ये चढली. दोन्ही वाहनं तिथून निघाली. आमच्या चिनी गाईडने स्वतःची ओळख करून दिली. तिचं नाव 'मे' - चिनी उच्चार 'मे‍ऽऽई'. चिनी वंशाची असूनही तिच्या अनेक पिढ्या सिंगापूरमध्येच गेल्या होत्या. त्यामुळे ती स्वतःला 'सिंगापोरिअन'च समजायची. ऍनाच्या तुलनेत ही फाड-फाड इंग्रजी बोलणारी, पक्की व्यावसायिक अशी होती. आम्हाला खूष करण्याकरता हिंदी वगैरे बोलायच्या फंदात पडली नाही. सिंगापूरबद्दल जुजबी माहिती दिल्यानंतर तिने तिथले नियम सांगायला सुरूवात केली. ते नियम आपल्या भारतीयांच्या मानाने चांगलेच कडक होते. आता ते तसे येणाऱ्या प्रत्येक परदेशी माणसाला सांगितले जातात की फक्त भारतीयांनाच - ते कळलं नाही पण सार्वजनिक ठिकाणी काही कचरा केल्यास किंवा धूम्रपान केल्यास १००० डॉलर्स दंड, ट्रॅफ़िकमधून पळत रस्ता ओलांडला तर ५०० डॉलर्स दंड, अमुक केलं तर इतका दंड, तमुक झालं तर इतका दंड, अजून कश्यासाठीतरी तुरुंगवास - काही विचारू नका. ती यादी चांगली लांबलचक होती. ते सगळे नियम ऐकून मंडळी थोडावेळ एकदम चिडीचूप झाली. मग हळूच कुणीतरी म्हणालं - 'श्वास घेतला तर चालेल ना?' .... आणि बसमध्ये हास्याचा जो स्फोट झाला ना की विचारता सोय नाही. विचारणारा नक्की पुणेकर असणार यात शंकाच नव्हती!! पुढे २-३ दिवस त्या 'नियम आणि दंड' या जोडगोळीची सगळ्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली - पण फक्त मराठीतून आणि शाब्दिकच ... प्रत्यक्ष नियम मोडायची कुणाची टाप नव्हती.
अर्धा-पाऊण तास बसचा प्रवास होता. बाहेर अंधार असल्यामुळे जास्त काही पाहता आलं नाही पण जे काही थोडंफार पाहिलं त्यात सगळ्यात जास्त काय लक्षात राहिलं तर कमालीची स्वच्छ्ता!!

'हॉटेल न्यू पार्क' ला पोचेपर्यंत साडेआठ वाजत आले होते. नवव्या मजल्यावर सगळ्यांच्या खोल्या होत्या. खोलीत सामान टाकलं, खिडकीचा पडदा सारला आणि अहाहा! काचेतून अप्रतिम दृश्य दिसत होतं. विहंगम दृश्याची मजाच काही और असते. पण तसं तिथे बघत उभं रहायला वेळ नव्हता कारण जेवायला जायचं होतं.
हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर एक भारतीय रेस्तरॉं होतं. तिथे जेवलो. त्याला लागूनच 'मुस्तफ़ा मॉल' होता. त्या मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे तो चोवीस तास उघडा असतो. जेवण झाल्यावर थाई बाथ बदलून सिंगापूर डॉलर्स घेतले. एकदम गरीब झाल्यासारखं वाटलं कारण रुपये आणि बाथ साधारण सारखे आणि एका सिंगापूर डॉलरला सत्तावीस रुपये मोजावे लागतात. कित्येक आशियाई राष्ट्रांच्या तुलनेतही आपली अर्थव्यवस्था अजून किती दुबळी आहे .... आपल्या आर्थिक विकासाच्या गप्पा कधी प्रत्यक्षात उतरणार? पडत असेलही म्हणा रोज थोडा-थोडा फरक पण तो पैश्यांच्या हिशोबातला फरक चलन बदलून घेताना ग्राह्य धरला जात नाही. कदाचित अजून दहा-पंधरा वर्षांनी तो जाणवेल.
जेवणानंतर मॉलला एक भेट द्यायचा बेत होता पण पोट भरल्यावर दिवसभराचा सगळा शीण डोळ्यात उतरायला लागला होता. त्यामुळे सरळ हॉटेलवर परत आलो....

अजय सोडून आम्हा पाचजणांची ही पहिलीच परदेशवारी होती आणि त्यातसुध्दा का कोण जाणे पण सिंगापूरबद्दल एक विशेष आकर्षण होतं. 'सिंगापूर' या नावाभोवतीच एक वलय आहे. अश्या त्या वलयांकित शहरात आज आम्ही प्रवेश केला होता आणि आता पुढचे दोन दिवस त्या वलयाचे निरनिराळे आविष्कार पाहणार होतो ....

ऑर्किड्सचा उत्सव.

घरी रोज सकाळी कानाशी किमान अर्धा तास गजर वाजल्याशिवाय झोपेतून न उठणारी मी, गेले ७-८ दिवस मात्र फ़ोनवरून गजर वाजायच्या आत जागी होत होते.
त्यादिवशीपण अशीच सहा वाजताच जाग आली. बाहेर चांगलं उजाडलं होतं. जाग आल्यावर पहिलं काम काय तर खिडकीतून बाहेरचं दृश्य पहायचं. मी पडदे सारले आणि सिंगापूरनं पहिला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. सकाळी सहा-सव्वासहालासुध्दा रस्त्यांवरचे सिग्नल्स सुरु होते आणि मुख्य म्हणजे ज्या काही एक-दोन तुरळक गाड्या येत-जात होत्या त्या ते इमानदारीत पाळत होत्या - अगदी दुचाकीवालेसुध्दा लाल दिव्याचा मान राखत होते. सक्काळी-सक्काळी, रस्ता रिकामा असताना, वाहतूक पोलीस आसपास दिसत नसताना मनावर एवढा ताबा ठेवायचा म्हणजे खायचं काम नाहीये!!! अशी महान कामं सहजासहजी जमत नाहीत - त्यासाठी अंगी शिस्त बाळगावी लागते!! सिंगापूरच्या प्रगतीचं तेच तर पहिलं मुख्य कारण आहे - वैयक्तिक पातळीवरची शिस्त!! त्याबाबत असलेल्या कडक नियमांची झलक आम्हाला आदल्या दिवशी ऐकायला मिळालीच होती. त्यांची अंमलबजावणी पण तितक्याच तत्परतेने आणि ताबडतोब होत असणार त्याशिवाय तो दुचाकीवाला तसा तिथे लाल दिवा पाहून थांबला नसता.
पण, 'परदेशात गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या देशाशी तुलना करावी का?' असाही प्रश्न पडतो. दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला मूठभर त्याच गोष्टी दाखवल्या जातात ज्या पाहून आपण यजमान देशाचे कौतुक करू. आपल्याकडे चार दिवस मुंबई बघायला आलेल्या परदेशी पाहुण्याला आपण दक्षिण मुंबईतच फिरवून आणणार ना!! धारावीला नाही नेणार ......
हे सगळे विचार तिथे उभ्याउभ्या एक-दोन मिनिटांत माझ्या मनात झळकून गेले......
सगळं आवरून, नाश्ता वगैरे करून हॉटेलच्या बाहेर आलो. लॉबीतून रस्त्यावर येण्यासाठी ८-१० पायऱ्या उतराव्या लागायच्या. त्या पायऱ्यांच्या एका बाजूला सामानासाठी एक छोटासा सरकता पट्टा होता. गरज असेल त्याप्रमाणे त्याची दिशा वर किंवा खाली अशी बदलता यायची. त्या पट्ट्यावरून घसरगुंडीसारखं किमान एकदातरी वरखाली करण्याची आदित्यची फार इच्छा होती.
नऊ-साडेनऊला निघालो. मुख्य रस्त्याला लागल्यावर गाईडच्या बडबडीपेक्षा आपसूकच बाहेरच्या दृश्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. दिवसा सिंगापूर फारच देखणं आहे. टोलेजंग, आकर्षक इमारती, स्वच्छ आणि रुंद रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं, कुठेही तुंबलेली वाहतूक नाही की भकाभक धूर ओकणाऱ्या गाड्या नाहीत. वाहतूक पोलीस कुठेही दिसला नाही आणि तरी सकाळच्या गर्दीची वेळ असूनही सगळं सुरळीत चाललेलं होतं. पायी चालणारा एकही माणूस दिसला नाही. एकंदरच तिथे माणसं कमी आणि झाडं जास्त दिसली दोन दिवसांत!! ते सुंदर रस्ते बघावेत की माना उंचावून त्या छानछान इमारती बघाव्यात ते कळेना.
त्यादिवशी आम्हाला 'बोटॅनिकल गार्डन' आणि तिथली ऑर्किड्स पहायला जायचं होतं. 'ऑर्किड्स' आपल्याला तशी फारशी परिचयाची नाहीत. मी तर नैसर्गिक ऑर्किड्सपेक्षा कृत्रिमच जास्त पाहिली होती. पण तिथे त्यादिवशी डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं. 'बोटॅनिकल गार्डन' अश्या साध्यासुध्या नावाच्या त्या बागेत फुलांचा एक नितांत सुंदर उत्सवच होता.

4042-24.jpg

किती रंग आणि किती प्रकार .... काय पाहू, किती फ़ोटो काढू असं झालं होतं. तिथे 'सेलेब्रिटी ऑर्किड्स' असा एक विभाग होता. जेव्हा कुठलीही सुप्रसिध्द व्यक्ती सिंगापूरला आणि त्या बागेला भेट देते तेव्हा त्या-त्या व्यक्तीच्या हस्ते तिथे एक ऑर्किडचं रोप लावलं जातं, त्या व्यक्तीच्या नावाची पाटी तिथे रोवली जाते आणि त्या रोपाला त्याच नावाने पुढे ओळखलं जातं. जगातली अनेक सुपरिचित नावं तिथे निरनिराळ्या पाट्यांवर लिहिलेली दिसली. त्यांत एक 'इंदिरा गांधी ऑर्किड' अशीपण पाटी होती.
सुकलेल्या पाना-फुलांचा कुठेही कचरा नव्हता. पायवाटेवर एखाद्‍दुसरं वाळकं पान दिसलं रे दिसलं की कुठूनतरी झाडलोट करणारी एखादी बाई यायची आणि ते उचलायची.
त्या बागेत एक हरितगृह पण होतं जिथलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा थोडं कमी ठेवलेलं होतं. खास पर्जन्यवृक्षांच्या अनेक दुर्मिळ जाती तिथे लावलेल्या होत्या. तिथेच Venus Fly Trap आणि Pitcher Plant ही दोन झाडं पहायला मिळाली. ते पाहून आदित्य तर आनंदाने ओरडलाच. या कीटकभक्षक झाडांबद्दल नुकताच तो शाळेत शिकला होता ना!! त्याने मला मुद्दाम त्या दोन झाडांचे फ़ोटो काढायला लावले.

4042-34.jpg

त्याला ते शाळेत नेऊन त्याच्या 'सायन्स टीचर'ला दाखवायचे होते. मला म्हणाला - "माझ्या वर्गात आता मी एकटाच आहे की ज्याने ही झाडं प्रत्यक्ष पाहिलीयेत." कुणाला कुठल्या गोष्टीत आणि कसा आनंद गवसेल काही सांगता येत नाही!!!
त्या हरितगृहातून बाहेर पडलो. मग गाईडनं आम्हाला सिंगापूरचं राष्ट्रीय फूल दाखवलं. मात्र आधीची सगळी फुलं पाहिल्यावर ते फूल अगदीच साधं वाटलं. त्याला राष्ट्रीय फुलाचा दर्जा का द्यावासा वाटला असेल काही कळलं नाही....
ऑर्किड गार्डन मधून निघायची वेळ झाली होती. एका तासात लगेच जायचं? तो आख्खा दिवस तिथेच घालवता आला असता तर किती बरं झालं असतं!!
तिथून आम्हाला अजून एक 'सिंगापूर स्पेश्यल' गोष्ट पहायला जायचं होतं ती म्हणजे Merlion - मासा आणि सिंह यांचं मिश्रण असलेलं एक शिल्प जे सिंगापूरच्या अनेक जाहिरातींत आपण पाहतो.

बोटॅनिकल गार्डनमधून बाहेर पडलो तेव्हा ढग दाटून आले होते आणि खूप उकडत होतं. पावसाची शक्यता वाटत होती. मनात म्हटलं - 'पावसापायी पुन्हा कोलंबोसारखी कुठली चुटपूट नको लागायला.' 'ऑर्चर्ड रोड' वरून आमची बस निघाली. हा म्हणजे सिंगापूरचा अगदी खास भाग. अनेक मोठ्यामोठ्या कंपन्यांची, बॅंकांची कार्यालयं तिथे आहेत. हल्ली अनेक हिंदी चित्रपटांतून सिंगापूरचं जे दर्शन घडतं ते याच भागातलं असतं. एका मोठ्या चौकाला फेरी मारून बस जात होती. त्या चौकात एक मोठं, वर्तुळाकार, दुमजली उंचीचं कारंजं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सुरू होतं आणि त्याचं दृश्य खूपच सुंदर असतं असं कळलं..... आम्ही फक्त ७-८ तास लवकर पोचलो होतो तिथे ... !!! आदित्यला अचानक शोध लागला की 'क्रिश' चित्रपटात ह्रितिक रोशन 'क्रिश'च्या वेशात तिथूनच उंच आकाशात झेप घेतो. चला...म्हणजे ऑर्चर्ड रोडवर त्यालाही लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी सापडलं!! नाहीतर त्या छानछान इमारती आणि रस्ते पाहण्यात त्याला बिलकुल रस नव्हता.
.... दरम्यान पावसाची एक सर पडून गेली होती. ऑर्चर्ड रोडवरून बस 'सीन' नदीच्या काठी आली. तिथे आम्ही उतरलो. Merlion चा कुठे मागमूसही नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तरी ते एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं शिल्प होतं. बरं, इतकावेळ बसमधून लांबूनपण एकही झलक दिसली नव्हती.
नदीकाठी खाली जायला पायऱ्या होत्या...म्हणजे Merlion पहायला नदीकाठच्या सिंगापूरी घाटावर उतरायचं होतं तर!! पाऊस पडून गेल्यावर आपण आपल्या रस्त्यांवरून सहज चालूही शकत नाही. पण तिथे आम्हाला काहीही फरक पडला नाही. कुठेही पाणी साचलेलं नव्हतं, चिखलाचा तर प्रश्नच नव्हता. 'चिखल' हा शब्द तरी तिथे लोकांना माहीत असेल की नाही कोण जाणे! बागकामाच्या अभ्यासक्रमात शिकायला आलेल्या माळ्यांना आधी 'चिखल' म्हणजे काय तेच शिकवत असतील!!
खाली उतरून शंभरएक पावलं चालून गेलो, रस्ता उजवीकडे वळला आणि अचानक Merlion समोर उभा ठाकला.

4041-04.jpg

सुमारे २५-३० फ़ूट उंचीचं ते पांढरं शिल्प म्हणजे 'सिंगापूरची शान' समजलं जातं. त्याच्या सिंहाच्या आकाराच्या तोंडातून सतत पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर उडत असतो. पाण्याचा सतत संपर्क असूनही कसलीही घाण नाही की शेवाळं नाही ... एकदम स्वच्छ!! उंच, आधुनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर छान वाटत होता पहायला. थोड्या वेळाने जाणवलं की माझ्या डोळ्यांसमोर हा Merlion नव्हता, थोडा मोठा होता .... मग तो कुठला?? गाईडला विचारलं तर ती म्हणाली की सिंगापूरला तसे दोन आहेत पण पाणी उडवणारा हाच. त्याक्षणी तरी तो आकार पाहून माझा थोडा विरसच झाला.
समोर 'सीन' नदीचं रुंद पात्र होतं. लोकांना उभं राहून निरीक्षण करायला लोखंडी कठडा होता. पलिकडच्या काठावरपण गगनचुंबी इमारती दिसत होत्या. त्यातल्या एका इमारतीकडे बोट दाखवून आदित्यनं मला सांगितलं की मगाचच्या त्या कारंज्यापासून उडलेला क्रिश त्या इमारतीवर उतरतो. चला, म्हणजे हे ही बरं झालं ... त्याचा मगाशी अर्धवट राहिलेला शोधही पूर्ण झाला.
तिथे २-३ फ़ोटो-बिटो काढले आणि निघालो. आदित्य भूकभूक करायला लागला होता ... पायऱ्या चढून पुन्हा रस्त्यावर येण्यापूर्वी वाटेत खाण्यापिण्याची दुकानं होती, ती त्याने जातानाच हेरून ठेवली होती!! पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. रस्त्यात फार वेळ बस उभी करायला परवानगी नव्हती. त्यामुळे गाईडने चलायची घाई केली.

तिथून मग जायचं होतं 'चायना टाऊन' आणि 'लिट्ल इंडिया' पहायला ... व्यापारासाठी म्हणून १९व्या शतकात तिथे येऊन राहिलेल्या अनुक्रमे चिनी आणि भारतीय लोकांच्या 'सिंगापूरचा जुना गावभाग' वाटतील अश्या त्या वसाहती होत्या. तिथे पोचेपर्यंत पुन्हा पावसाची एक सर येऊन गेली. 'लिट्ल इंडिया'त एक देऊळ पहायचं होतं. बाह्य रूपावरून ते देऊळ दक्षिण भारतीय धाटणीचं वाटलं. आदित्यला फारच भूक लागली होती त्यामुळे मी आणि अजय देवळात जाण्याऐवजी त्याच्यासाठी काही खायला मिळतंय का ते पाहायला लागलो. दरम्यान आदित्यला एक cold drinks चं दुकान दिसलं होतं. मग त्याने आपला 'काहीतरी खाण्या'ऐवजी 'काहीतरी पिण्या'चा मनसुबा जाहीर केला. एखाद्या टोपलीत उरलेसुरले कांदे-बटाटे ठेवावेत तसे त्या दुकानात cold coffee चे कॅन्स ठेवले होते विकायला. किंमत अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती - १.२५ सिं. डॉलर्स फक्त. त्यामुळे मला शंका आली. म्हणून मी तिथल्या विक्रेतीला "माल ताजा आहे ना?" असं विचारलं, तर तिला त्या प्रश्नाचा रागच आला. कदाचित ’जुना माल विकणे’ हा सुध्दा एक गुन्हाच असेल तिथे, कुणी विकताना सापडला तर काही शे किंवा काही हजार दंड असेल, पण ते मला कसं कळणार ना!! मी माझं शंकानिरसन नको का करून घ्यायला?? जरा घुश्श्यातच तिने सुटे पैसे (की डॉलर्स) परत केले. त्या सगळ्या अनोळखी नाण्यांच्या किमती शोधून हिशोब बरोबर आहे की नाही याची खात्री करून घे‍ईपर्यंत आदित्यची cold coffee पिऊन झाली सुध्दा!! त्या आघाडीवर आता थोडा वेळ शांतता राहणार होती.

बसच्या दिशेने चालायला सुरूवात केली. डावीकडून एक गल्लीवजा रस्ता मुख्य रस्त्याला येऊन मिळत होता. तो ओलांडण्यासाठी मी डावीकडे पाहिलं तर त्या दिशेने एक चकाचक कार येत होती. म्हणून मी थांबले. तर गंमत म्हणजे मला चालत रस्ता पार करायचा आहे म्हटल्यावर त्या कारवाल्यानं वेग कमी केला आणि मी निघून जाण्याची वाट पाहत चक्क तोच थांबला. दिवसात दुसऱ्यांदा मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या थांबण्याचं कारण मला जरा वेळाने कळलं. मनातल्या मनात त्याच्या सौजन्याचं कौतुक करत मग मी पुढे चालायला लागले.

दुपारचा एक-दीड वाजत आला होता. आदल्या दिवशीच्याच रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. जेवणानंतर तासाभरात निघायचं होतं - सेन्टोसा आयलंडला भेट द्यायला.
पुन्हा तसेच बसनं छानछान रस्ते, झाडं बघत आम्ही 'माउंट फ़ेबर'च्या रस्त्याला लागलो. 'माउंट फ़ेबर' - सिंगापूर बेटावरची एकमेव टेकडी ... त्यामुळे त्याचं त्यांना केवढं अप्रूप!! एक छोटासा घाट चढून बस त्या टेकडीच्या माथ्यावर पोचली. तिथून 'केबल कार'ने सेन्टोसा आयलंडला जायचं होतं. त्याआधी आम्ही एकदाच केबलकारमध्ये बसलो होतो - रायगडावर जाताना. ही त्यापेक्षा थोडी वेगळी होती - म्हणजे तिथे मोठा डोंगर चढून गेलो होतो, इथे एक लांब-रुंद खाडी पार करून जायचं होतं. 'रविवार असल्यामुळे गर्दी असेल' अशी गाईडने पूर्वसूचना दिलेली होती. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची तयारी करून गेलो तर तिथे अवघी २०-३० माणसं दिसली!! ही कसली गर्दी? हा तर शुकशुकाट झाला!! 'गर्दी' म्हणजे कशी किमान शे-सव्वाशे माणसं तरी पाहिजेत!! अक्षरशः ५-१० मि. रांगेत उभं रहावं लागलं ...
केबल कार मध्ये बसून 'माउंट फ़ेबर' स्टेशनमधून बाहेर पडलो आणि खाली सिंगापूर बंदराचं झकास दृश्य दिसलं. आमच्या बरोब्बर खाली मोठीच्यामोठी Star Cruise उभी होती. पर्यटनासंबंधीच्या अनेक लेखांत त्याच्याबद्दल वाचलं होतं. तिथल्या डेकवर उभी असलेली माणसं छोट्याछोट्या ठिपक्यांएवढी दिसत होती. वाटेत एक स्टेशन लागलं. काहीजण उतरले, काही चढले. आम्हाला पुढे जायचं होतं.....थोड्या वेळाने डाव्या हाताला अचानक त्या दुसऱ्या मोठ्ठ्या Merlion ची झलक दिसली. सकाळपासून माझ्या नजरेसमोरून जी आकृती हालत नव्हती ती हीच!! पुन्हा ५-१० मि. हवेत लटकत पुढे सरकल्यावर आमचं स्टेशन आलं.

सेंटोसा हे सिंगापूरचंच भावंड - तसंच स्वच्छ, तसंच हिरवंगाऽऽर !! प्रथम जायचं होतं Wax Museum पहायला. त्याच्या प्रवेशद्वारापाशीच एक पुरातन कार्यालयीन खोलीचा देखावा उभा केलेला होता. फार पूर्वी ब्रिटीश, भारतीय, चिनी आणि मलाय - अश्या चार वंशाचे दर्यावर्दी व्यापारी सर्वप्रथम सिंगापूरच्या बेटावर पोचले. सिंगापूरच्या जडणघडणीत या चारही वंशांचा महत्वाचा वाटा आहे. तर त्या काळी त्यांच्या वापरात असलेल्या टेबल-खुर्च्या, लेखन साहित्य अश्या सगळ्या वस्तूंचं ते एक छोटेखानी प्रदर्शनच होतं. तिथून आत गेल्यावर सर्वात आधी एक पाच मिनिटांचा त्याच काळाचं वर्णन करणारा माहितीपट दाखवला गेला. तिथून पुढे गेल्यावर मेणांच्या पुतळ्यांच्या वापर करून तेव्हाच्या लोकजीवनातले निरनिराळे देखावे उभे केलेले होते. तेव्हाच्या गोदी कामगारांचं जीवन, न्यायनिवाड्याच्या पध्दती, वेगवेगळे सणवार - हे सगळं तिथे पहायला मिळालं.
तिथून बाहेर आल्यावर 'मरीन वर्ल्ड' पहायला गेलो. कल्पना करा की खोल समुद्रातल्या एखाद्या काचेच्या पारदर्शक बोगद्यातून आपण चाललोय, भोवती लहान-मोठे असंख्य मासे फिरताहेत ... तर कसं वाटेल तसा तो एक अफलातून अनुभव होता!! एक ८६ मी. लांबीचा ऍक्रिलिकचा बोगदा होता. त्या बंदिस्त बोगद्यातून आपण चालत जायचं. बाहेर आपल्याभोवती संपूर्ण पाणी असतं आणि त्यात सगळे जलचर विहरत असतात. समुद्र, त्यातल्या वनस्पती, खडकाळ तळ याची इतकी हुबेहूब प्रतिकृती बनवलेली होती की मी बराच वेळ 'आपण खऱ्या समुद्रातच उतरलो आहोत' असंच समजत होते. तो माझा गैरसमज आदित्यनं दूर केला!!! बोगद्यातल्या रस्त्यावर अर्ध्या भागात सरकता पट्टा होता...चालायचा कंटाळा आला की त्याच्यावर जाऊन उभं रहायचं. The Crocodile Hunter - स्टीव्ह आयर्विनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला 'स्टिंग रे' तिथे पाहिला. आमच्या डोक्यावरून तो जाताना लक्षात आलं की त्याच्या पंखांचा घेर एका मोठ्या छत्रीएवढा होता.
सरकता पट्टा आणि निरनिराळे मासे - या दोन आकर्षणांमुळे आदित्य त्या बोगद्यातून दोनदा फिरून आला. बोगद्यातली फेरी संपल्यावर बाहेर पडायच्या मार्गावर भिंतींवर अनेक छोटी-छोटी aquariums लावलेली होती. म्हणजे त्यांची एक बाजू फक्त भिंतींवर दिसत होती. त्यामुळे त्या जणू हलणाऱ्या तसबीरीच वाटत होत्या!! हाताच्या मुठीत मावतील असे Jelly Fish आणि अंगठ्याच्या आकाराचे Sea Horse त्यात तरंगत होते ..... बघण्यासारखं इतकं होतं पण शेवटी पाय दुखायला लागले म्हणून आवरतं घ्यावं लागलं.

मरीन वर्ल्ड मधून बाहेर पडल्यावर समोर एक छोटी बाग होती. तिथून तो दुसरा Merlion व्यवस्थित दिसत होता. ती बागपण अनेक हिंदी चित्रपटांत दिसते. तिथे एका ठिकाणी जमिनीवर अमेरिकेतल्या महत्वाच्या शहरांच्या दिशा आणि त्या जागेपासूनचे त्यांचे अंतर अशी माहिती रंगवून ठेवलेली होती. कॅलिफ़ोर्निया तिथून साधारण चौदा हजार कि.मी.वर होते. मला ते अंतरांचे आकडे वाचून लगेच विमान, इकॉनॉमी क्लास ह्या सगळ्या गोष्टीच आठवायला लागल्या आणि तिथून मी काढता पाय घेतला .....
सहा वाजत आले होते. सिंगापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची एक झलक आता पहायला मिळणार होती. आता आम्हाला जायचं होतं 'म्युझिकल फ़ाऊंटन शो' पहायला. चक्क एका 'बस स्टॉप' वर जाऊन उभे राहिलो. 'रविवार आहे, गर्दी आहे, बसमध्ये पटकन चढावं लागतं, बस जास्त वेळ थांबत नाही' या गाईडच्या सूचना आम्ही ऐकून सरळ सोडून दिल्या !! 'गर्दी आणि सार्वजनिक वाहतूक' या विषयाच्या परिक्षेत आम्ही सगळे तिच्यापेक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असतो. आपल्या एखाद्या 'आराम बस'च्या तोंडात मारेल अशी ती तिथली सार्वजनिक वाहतूक करणारी बस आली. एकदम रुंद आणि मस्त ऐसपैस !! फक्त बसायला बाकं अगदी कमी आणि उभं रहायला मात्र भरपूर जागा ... हादरे, गचके बसायचा तर प्रश्नच नव्हता, रस्ते लोण्याहूनही मऊ होते .... पोटातलं पाणीपण हललं नाही. १०-१५ मि.त आमचा 'इश्टाप' आला.
'म्युझिकल फ़ाऊंटन शो' सुरू व्हायला अजून बराच वेळ होता पण योग्य जागा पकडण्यासाठी आम्ही तिथे जवळजवळ तास-दीड तास लवकर गेलो होतो. तेवढा वेळ मात्र जरा कंटाळवाणा गेला. दिवसभर दमणूक झाली होती, जरा चहा-कॉफ़ी प्यावी म्हटलं तर कुठे मिळाली नव्हती, थोडी भूकपण लागली होती. काहीतरी बडबड करून, गप्पा मारून मी आदित्यचा किल्ला लढवला तासभर. पूर्ण अंधार पडून 'शो' सुरू झाल्यावर मात्र त्याचा कंटाळा गेला. सगळेच पाऊण-एक तास हरवून गेले होते.

आठाच्या सुमाराला 'शो' संपला. दुपारी 'माऊंट फ़ेबर'पाशी सोडलेली बस बाहेर आमची वाट पाहत उभी होती. येताना केबलकारनं आलो तरी सिंगापूरला परतताना बसनं जायचं होतं. जाताना सीन नदी, तिच्यावरचा तो सकाळचा घाट सगळं पुन्हा दिसलं. हॉटेलपाशी उतरून आधी थेट जेवायला गेलो.

हॉटेलच्या रूमवर परतल्यावर मी नेहेमीच्या सवयीनं झोपण्यापूर्वी खिडकीत जाऊन उभी राहिले. रेस्तरॉंसमोरच्या रस्त्यावर दिवाळीनिमित्त केलेली रोषणाई तिथून छान चमचम करताना दिसत होती. सिग्नल्स तसेच चालू होते. मध्यरात्री २-३ वाजता सुध्दा ते पाळले जाताहेत का ते पहायची माझी फार इच्छा होती. पण झोपणं आवश्यक होतं. आडवं पडल्यावर बंद डोळ्यांसमोरून संध्याकाळचा तो मोठ्ठाच्या मोठ्ठा 'स्टिंग रे' पोहत गेला .....

 तिसऱ्या रानडुकराची आरोळी.

रोज सकाळी नाश्त्याच्या हॉलमध्ये शिरताना दारात आपला 'रूम नं.' सांगावा लागायचा. कोलंबो, पट्टाया आणि बॅंकॉक नंतरचं हे चौथं हॉटेल होतं. दर दोन दिवसांनी त्या-त्या ठिकाणचे नवीन क्रमांक लक्षात ठेवायचे म्हणजे भलतंच कठीण काम होतं. त्यादिवशी पण मी नाश्त्याला एकटीच खाली आले आणि नंबर विचारला गेल्यावर एकदम गडबडले. तिथला रूम नंबर सोडून आधीचे सगळे आठवले पण जो हवा होता तो आठवेचना !! बरं, 'कार्ड की' असल्यामुळे त्याच्यावरही लिहिलेला नव्हता ... पण अनपेक्षितपणे आदित्य माझ्या मदतीला आला. तो माझ्याआधीच आवरून खाली आला होता आणि त्या हॉलमधे दारासमोरच्याच टेबलवर बसला होता. नेमकं त्याचवेळी त्याचं माझ्याकडे लक्षं गेलं, काय गोंधळ झालाय ते तिथूनच त्याच्या लक्षात आलं आणि बसल्या जागेवरूनच तो ओरडला - 'आईऽऽऽ, ९७८' .... मी एकदम चमकून आत पाहिलं. तोपर्यंत मला पत्ताच नव्हता की तो तिथे आहे आणि आपल्याकडेच पाहतोय. '९७८' हे शब्द मेंदूपर्यंत पोचायला जरा वेळ लागला आणि मग माझी ट्यूब पेटली. हे सगळं अक्षरशः काही सेकंदांतच घडलं पण नंतर आम्हाला दोघांनाही आठवून हसू येत होतं.

नाश्ता उरकून खाली लॉबीत आलो. लिफ़्ट्सच्या समोरच एक अतिशय सुंदर लँडस्केप बनवलेलं होतं. आपले नर्मदेतले गोटे असतात तसे लहानमोठ्या आकाराचे गुळगुळीत दगड आणि त्यातून झुळझूळ वाहणारं कारंजं .... नेहेमीच्या लँडस्केप्सपेक्षा उंची एकदम कमी - जेमतेम ७-८ इंच. पण त्यामुळेच आल्यापासून ते लक्ष वेधून घेत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यादिवशी तिथल्या त्या पाण्याचं परिक्षण चालू होतं!!! 'कारंज्यातलं पाणी दूषित तर नाही ना' याची तिथल्या लोकांना चिंता पडली होती!! तसंही ते योग्यच होतं म्हणा. कारण तिथे प्रत्येक नळांतून प्यायचं पाणीच वाहत असतं. त्यामुळे तिथे फिरताना जवळ पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची कटकट नव्हती. तहान लागली की बागेतला एखादा नळ सोडा आणि पाणी प्या इतकं सोपं होतं. म्हणजेच त्या तिथल्या कारंज्यातही प्यायचं पाणीच वाहत असणार ... मला वाटतं ते लोक आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नुसते डोकावले ना, तरी बेशुध्द पडतील बहुतेक!!!

सगळे निघायच्या तयारीत होतो पण आमची गाईड आलेली नव्हती अजून. मग हॉटेलच्या आवारात जरा इकडे-तिकडे करायला सुरूवात केली. प्रवासी येत होते, जात होते, बॅगांचे ढीग चढत होते, उतरत होते; कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. कोण सिंगापूरला प्रथमच आलंय, कोण अनेकदा येऊन गेलंय याच्याशी त्यांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी पायऱ्या उतरून खाली आले. आवारात रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली होती आणि त्यांच्या कडेने ३-४ फ़ूट उंचीचे संरक्षक कठडे लावलेले होते. खरं म्हणजे, थोडा वेळ 'टेकायला' ती जागा एकदम मस्त होती - आसपास इतकी छान झाडंबिडं ... मला मोह आवरला नाही. जरा तिथे बसतीये न बसतीये तोच कुठूनतरी हॉटेलचा एक माणूस आला आणि मला त्याने तिथून उठायला लावलं. कारण काय - तर तसं तिथे बसल्याने झाडांची नासधूस होते. ऐकताक्षणी मला थोडा रागच आला, कारण आपल्यामुळे झाडांना काही त्रास होत नाहीये याची खात्री करूनच मी बसले होते. त्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असं हटकलं जाण्याची आपल्या देशात आपल्यावर क्वचितच वेळ येते. उठले मग तिथून - करणार काय? पण माझ्यासारखेच इतर काहीजण जे बसले होते त्यांना मात्र खरंच त्या झाडांची पर्वा नव्हती असं लक्षात आलं. तसं होतं तर मग त्या माणसाने सगळ्यांनाच तिथून उठवलं त्यात त्याची काहीच चूक नव्हती!!! अजयच्या मते ते पाण्याचं परिक्षण काय, हे असं लोकांना बसल्या जागचं उठवणं काय, हे सगळे तारांकित हॉटेलचे नखरे होते. पण मला नाही तसं वाटलं कारण शिस्त, स्वच्छता आणि नियमांचं पालन या गोष्टी तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या. आपल्या देशात जर असं प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवायचं म्हटलं तर रोजची कामं सोडून दिवसभर तेच करत बसावं लागेल आणि तरीही शेवटी 'जनजागृती' वगैरे साध्य होणार नाही ती नाहीच!!! पण परदेश प्रवास हा अश्या विरोधाभासांमुळेच तर लक्षात राहतो ...

१० वाजत आले होते. धावत-पळत आमची गाईड आली. आमची रोजची बस बिघडली होती. दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याच्या नादात तिला उशीर झाला होता. सिंगापूरमध्ये वेळेचं बंधन पाळणं किती महत्वाचं आहे, तसं केलं नाही तर कसा भरमसाठ दंड भरावा लागतो इ. गोष्टींची तिनं आम्हाला आल्या-आल्या, पहिल्या दिवशीच भीती घातली होती. आता तिलाच उशीर झाला म्हटल्यावर मंडळींची तिला दंड ठोठावण्याची फार इच्छा होती. नुसत्या कल्पनेनंच सगळे खूष झाले. ५-१० मिनिटांत सगळे निघालो. बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर आपल्याकडे असतो त्याच्या चौपट मोठा आरसा लावलेला होता. त्यातून त्याला संपूर्ण बस व्यवस्थित दिसत असणार. आमचा मलेशियन ड्रायव्हर - मि. मलिक - बस चालवता-चालवता सुध्दा सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असायचा. बस निघाल्यावर वर ठेवलेल्या बॅगमधून काहीतरी काढण्यासाठी मी उभी राहिले तर त्याने माझ्याकडे त्या आरश्यातून असलं रोखून पाहिलं ना की मी बॅग उघडून त्यात हात घालून हवी ती वस्तू काढण्या‍ऐवजी पटकन ती बॅगच खाली घेऊन बसले. चालत्या गाडीत उभं राहणं हा पण तिथे गुन्हा मानला जातो ... म्हटलं उगीच झंझट नको कसलं!! कारण आमची गाईड सुध्दा बहुतेक वेळा बसूनच आमच्याशी बोलायची.

त्या दिवशी आमचा दौरा होता 'ज्युरॉंग बर्ड पार्क' ला ... 'बर्ड पार्क' हे नावच मुळात मला फार आवडलं ... 'पक्षी अभयारण्य' पेक्षा 'पक्ष्यांची बाग' हे ऐकायलाही छान वाटतं. जगभरातले जवळजवळ ३००० प्रकारचे पक्षी तिथे पहायला मिळतात. सुरुवातीला निशाचर पक्ष्यांचं एक वेगळं दालन होतं. त्या दालनात जोरजोरात बोलायला किंवा कॅमेऱ्याचे फ़्लॅश मारायला मनाई होती. बहिरी ससाणे, अनेक प्रकारची घुबडं तिथे पाहिली.
बाहेर मात्र काही अपवाद सोडले तर सगळे पक्षी मुक्तपणे विहरत होते. पण त्यांची वावरण्याची ठिकाणं आणि माणसांना हिंडायला दिलेली पायवाट यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं. आपण केवळ निरिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारे त्या पक्षांच्या संपर्कात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हात लावायचा प्रयत्न करणं, त्यांना काहीतरी खायला घालणं असल्या प्रकारांना आपोआपच आळा बसतो. अश्या ठिकाणी ते प्राणी किंवा पक्षी हेच सर्वात महत्वाचे घटक असतात याचं तिथे सतत भान ठेवलेलं दिसलं. सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात किंवा झाडावर अचानक एखादा सुंदर पक्षी दिसला तर आपली कशी प्रतिक्रिया असेल तसंच होत होतं तिथे. मुळात त्या बागेचा आराखडाच असा होता की 'सहज दिसावा' असेच सगळे पक्षी समोर यायचे. 'पक्षी बघायला आलो आहोत' हे माहिती असूनही दर वेळेला तोंडातून आश्चर्योद्गारच बाहेर पडायचे.
छोटे चिमण्यांसारखे पक्षी, जे जमिनीवर कमी चालतात, असे मात्र काहीसे बंदिस्त होते. पण ते ही कसे ... तर मोठ्ठंच्यामोठ्ठं आवार आणि त्याला १५-२० फ़ूट उंचीवरून बारीक मच्छरदाणीसारखी जाळी लावलेली. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याला कुठलाही अडसर नाही, पण ते पक्षीही इतरत्र कुठे उडून जाऊ शकणार नाहीत. कळस म्हणजे अश्या ह्या पक्ष्यांचं निरिक्षण करण्यासाठी त्या मच्छरदाणीच्या वरून फिरवून आणणारी एक छोटीशी लहान मुलांच्या बागेत असते तसली रेल्वेगाडी होती. त्या रेल्वेगाडीतून एक फेरी मारून आलो.

बॅंकॉकप्रमाणेच इथेही दोन 'शो' पाहिले - 'Birds for Pray Show' आणि 'Birds-N-Buddies Show'.

4051-06.jpg

पहिल्या शो मध्ये सगळे शिकारी पक्षी अगदी जवळून पहायला मिळाले. लांब अंतरावरून सावज टिपण्यासाठी त्यांनी घेतलेली झेप, त्यांची तीक्ष्ण नजर इ. ची प्रात्यक्षिकं फारच छान होती. दुसरा शो लहान मुलांना आवडेल असा होता. तिथेही अनेक नवखे पक्षी पहायला मजा आली.
नेहेमीप्रमाणेच, त्या बागेत घालवलेला तास-दीड तास आम्हाला कमी वाटला....

तिथून निघायची वेळ झाली होती. आदित्यला तेवढ्यात एक आईसक्रीमचं दुकान दिसलंच. पण सकाळपासूनच ढगाळ हवेमुळे इतकं उकडत होतं की त्यानं आईसक्रीमची मागणी करण्याची मी वाटच पाहत होते. आम्ही तिघांनी मारे अगदी 'डबल लार्ज स्कूप' वगैरे खाल्ले पण नंतर बिलाचा आकडा पाहून माझ्या आणि अजयच्या पोटात त्या 'डबल लार्ज स्कूप' पेक्षा मोठा गोळा आला!!! तेवढ्या किंमतीत इथे महिनाभर आम्हाला तिघांना भरपूर आईसक्रीम खाता आलं असतं!!! पण आता त्याचा विचार करून काय फायदा होता? गुपचूप पैसे दिले आणि आदित्यनं अजून कशाची मागणी करण्याच्या आत तिथून काढता पाय घेतला.

आता बसनं न जाता आम्ही मेट्रो ट्रेनने हॉटेलवर परतणार होतो. सिंगापूरची MRT Train ही लंडनच्या मेट्रो ट्रेनच्या तोडीस तोड समजली जाते. MRT म्हणजे Mass Rapid Transit. नावाप्रमाणेच ती माणसांची वेगानं वाहतूक करणारी व्यवस्था होती. साहजिकच काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं होतं. चुंबकीय तिकिटांनी उघडणारे स्वयंचलित दरवाजे, गाडीची आपोआप उघड-बंद होणारी दारं, त्यांचा कालावधी - या सगळ्यांबद्दल सौ. शिंदेनी खबरदारीचे उपाय सांगायला सुरूवात केल्यावर समस्त आजी-आजोबा मंडळी जरा चपापलीच होती. चुंबकीय तिकिटानं ओळख पटवून दार उघडल्यावर पट्कन त्या दारातून पुढे जावं लागतं नाहीतर मग एकदा दार बंद झालं की पुन्हा दुसरं तिकिट घ्यावं लागतं हे कळल्यावर तर बहुतेकांचं अवसानच गळालं. 'आम्ही आपले बसनं जातो ... आम्हाला नको ती ट्रेन राईड' असाही प्रस्ताव आला. मग आम्ही तरण्याताठ्यांनी त्यांना जरा धीर दिला आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून येण्याचा आग्रह केला.

बसनं आम्हाला 'ऑर्चर्ड' स्टेशनपाशी सोडलं. रस्त्यावरून स्टेशनमध्ये प्रवेश करायची इमारत अगदी सर्वसाधारण होती. तिच्याखाली इतका मोठा पसारा असेल याची कल्पनाच आली नाही. आत खाली उतरल्यावर सगळीकडे इतकं स्वच्छ आणि चकाचक होतं की त्या ठिकाणाला 'रेल्वे स्टेशन' म्हणणं जिवावर यावं!!! आमच्या गाईडनं सर्वांना तिकिटं दिली. अजूनही काही आजी-आजोबांची 'जावं की नको' अशी द्विधा मनस्थिती होती. तिकिटांची ओळख पटवायच्या ठिकाणी शेवटी एक आजी जरा जास्तच गांगरल्या आणि अडकल्या. पण त्यांना पुढे आणणं फारसं कठिण गेलं नाही.
तिथून खाली प्लॅटफ़ॉर्मवर आलो. एका बाजूला एक गाडी उभी होती. पण ती तिथून हलेपर्यंत कळलंच नाही की ती तिथे उभी होती. मोठमोठ्या फलकांवर गाड्यांचा मार्ग, वाटेतली स्टेशन्स इ. माहिती अतिशय आकर्षक पध्दतीने लिहून ठेवलेली होती. आम्हाला 'मरिना बे' या स्टेशनवर उतरायचं होतं. वाटेत ५-६ स्टेशन्स लागणार होती. त्यात एक 'धोबी घाट' नावाचं स्टेशन होतं. 'धोबी घाट' हा तद्दन भारतीय पण गटात न बसणारा शब्द तिथे वाचून हसू आलं. त्या स्टेशनचं ते तसं नाव का बरं पडलं असेल??
जरा इकडे-तिकडे बघेपर्यंत गाडी आली. सगळ्यांचा 'गृहपाठ' अगदी जय्यत तयार असल्यामुळे गाडीत चढताना मात्र काही गोंधळ झाला नाही. गाडीचा वेग अफाट होता. पुढचं स्टेशन कुठलं ते दाराजवळच्या 'इंडिकेटर'वर दिसत होतं. त्यामुळे 'माटुंगा आ गया?' असल्या प्रश्नांना थारा नव्हता. गाडीची दारं एकाच बाजूला असल्यामुळे 'कळवा कुठल्या बाजूला येणार?' हा ही प्रश्न नव्हता!! नवख्या माणसालाही सहजगत्या प्रवास करता यावा यासाठी असे साधे-सोपे उपाय पुरेसे असतात.
५-६ स्टेशन्स आणि काही कि.मी. अंतर पार करायला जेमतेम १०-१२ मिनिटं लागली. आम्ही 'मरिना बे' स्टेशनवर उतरलो, जमिनीच्या पोटातून वर रस्त्यावर आलो. तिथून अगदी समोरच आमचं हॉटेल दिसत होतं. अचानक लक्षात आलं की दोन दिवस हॉटेलच्या खिडकीतून उजव्या बाजूला एक जुन्या पध्दतीची इमारत मी पाहत होते, ते प्रत्यक्षात एक अत्याधुनिक मेट्रो स्टेशन होतं .... !!

जेवणाची वेळ झाली होती. त्या दिवशी आम्हाला चक्क घरगुती जेवणाचा डबा मिळणार होता. मस्त आमटी-भात, पोळी-भाजी, कोशिंबीर, गोडाचा शिरा .... मजा आली जेवायला. जेवणानंतरचा वेळ जरा निवांत होता. आजी-आजोबांनी विश्रांती घेतली, आम्ही चौघं 'मुस्तफ़ा मॉल' मध्ये फेरफटका मारून आलो. 'सिंगापूरच्या मॉल्समध्ये आम्हाला विसरू नका' असा आमच्या भगिनींचा निरोप होता. त्यामुळे त्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडा खिसा हलका केला....

दिवस बुडाल्यानंतर आम्हाला जायचं होतं 'नाईट सफ़ारी' पहायला. जगातलं एकमेव असं ठिकाण की जिथे रात्रीच्या वेळचा जंगली श्वापदांचा वावर पाहता येतो. तसं ते एक अभयारण्यच होतं. सगळीकडे मंद प्रकाशाचाच वापर केला गेलेला होता. एक अंधारमय गूढ वातावरण तिथे होतं. प्रथम Birds at Night Show पहायचा होता. तो शो सादर करणाऱ्या मुलीनं 'रात्रीच्या वेळी शिकार करणारे पक्षी' हा मूळ मुद्दा सोडून बाकीचीच इतकी आगाऊ बडबड केली ना की उगीच आलो इथे असं वाटलं.... त्यानंतर त्या जंगलातून एक फेरी मारायला जायचं होतं.
एक 'फुलराणी' सारखी गाडी आपल्याला सगळीकडे फिरवून आणते. चहूबाजूला किर्रर्र अंधार, रात्रीच्या वेळची जंगलातली जीवघेणी शांतता, आवाज हो‍ऊ नये म्हणून गाडीलाही रबराची चाकं लावलेली ... वाटेत अधे-मधे चांदण्याचा प्रकाश वाटावा इतपतच उजेड पाडणारे तुरळक, मंद दिवे ... प्राणी आणि गाडी यांच्यात कुठलाही अडसर नाही ... त्यात त्या गाडीला दारं-बिरं काही नाहीत ... वातावरण निर्मितीच असली झालेली होती ना ... गाडीच्या पुढच्या भागात एक मुलगी अगदी हळू, दबक्या आवाजात सगळी माहिती देत उभी होती. डावी-उजवीकडे जंगली प्राणी मोकळे-ढाकळे फिरत होते. मी गाडीच्या एका कडेला बसले होते. लांबवर एक रानडुकरांची जोडी दिसत होती. गाडीचा वेग अगदी कमी होता. ती मुलगी रानडुकरांची विशिष्ट आरोळी ऐकायला सांगत होती. म्हणून मी अगदी लक्षपूर्वक कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होते. दरम्यान एक तिसरं रानडुक्कर रस्त्यावर अगदी माझ्या पायाशी येऊन उभं राहिलेलं मला कळलंच नाही. त्या दोन रानडुकरांच्या आरोळीला प्रत्युत्तर म्हणून हे तिसरं पण जोरात चित्कारलं आणि मी नखशिखांत शहारले.....
हत्ती हा प्राणी इतर वेळी अगदी गरीब आणि निरुपद्रवी वाटला तरी रात्रीच्या अंधारात मोठ्या हत्तींचा कळप किती भितीदायक दिसतो हे तिथे त्या दिवशी कळलं. किती प्राण्यांचं आणि काय-काय वर्णन करणार ... !!! गाडीच्या फेरीप्रमाणेच त्या जंगलातून पायी फिरण्याचीही सोय होती. मला त्या पायवाटांवरून फिरायलाही आवडलं असतं. ज्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली होती त्याला आधीच्या त्या शो मधल्या आगाऊ, बडबड्या मुलीला तिथून हाकलून द्यायचं का कधी सुचलं नसेल कोण जाणे!!! तो शो आम्ही आधीच पाहिला ते बरं झालं नाहीतर या रंगाचा अगदी बेरंग झाला असता....

नाईट सफ़ारीतून बाहेर पडायला नऊ वाजले. जेवून हॉटेलवर परतलो. सामान आवरायचं कंटाळवाणं काम पुन्हा एकदा करायचं होतं. आमचं सिंगापूरमधलं वास्तव्य संपलेलं होतं....
केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या संगतीत या देशानं आम्हाला किती निरनिराळ्या अनुभवांनी समृध्द करून टाकलं होतं. मायदेशातल्या वास्तवाशी नकळत झालेल्या तुलनेने अंतर्मुख बनायला लावलेलं होतं ... या देशाकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, अनुकरण फक्त युरोप-अमेरिकेचंच करावं असं काही नाही याची सत्यता पटवून दिलेली होती ... त्यांच्या तोडीस तोड एक देश आपल्या आशिया खंडातच आहे याची जाणीव करून दिलेली होती ...

कुठल्याही प्रसंगाचे अथवा गोष्टीचे ढोबळमानाने तीन भाग करता येतात - सुरूवात, मध्य आणि शेवट. सुरूवातीची उत्सुकता आणि शेवटाची हुरहूर सोडली तर मध्य हा त्या प्रसंगाचा गाभा असतो ... सिंगापूर हा माझ्या पहिल्याच अविस्मरणीय परदेश सहलीचा तेवढाच अविस्मरणीय गाभा ठरला होता....

 सेलामत दातांग ... !!!

निघताना हुरहूर लागावी इतकं कोलंबोत राहिलोच नाही. थायलंडमध्ये खरं तर सर्वात जास्त मुक्काम होता. पण थायलंड सोडतानाही तसं काही वाटलं नाही ... एक तर पॅरासेलिंगच्या प्रभावातून मन अजून बाहेर आलं नव्हतं, शिवाय सिंगापूरची उत्सुकता होती. पण त्यादिवशी सिंगापूर सोडताना मात्र प्रथमच मनाला थोडीशी हुरहूर जाणवली. अजून २-३ दिवस तिथे रहायला सगळ्यांना आवडलं असतं. बॅंकॉकच्या रस्त्यांवरची गर्दी, खाद्यपदार्थांचे कसेतरीच, उग्र वास - काहीतरी होतं टीका करण्यासारखं ... पण या देशाने मात्र नावं ठेवायला जागाच सोडली नव्हती!! दोन दिवसांत मुख्य ठिकाणं पाहून झाली तरी इतर ठिकाणं पाहण्याच्या निमित्तानं अजून तिथला वाढीव मुक्काम चालला असता. शिवाय आपल्या सहलीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय हे सुध्दा आत कुठेतरी सतत जाणवत होतं.

तरी त्यातल्यात्यात काहीतरी नाविन्य शोधायचं म्हटलं तर होतंच - त्यादिवशी आम्ही मलेशियाला जाणार होतो पण ते विमानानं नाही, तर बसनंच. अकरा-साडेअकराला आवरून खाली आलो. सामान आधीच खाली त्या छोट्या सरकत्या पट्ट्याजवळ जमा झालेलं होतं. सरहद्द ओलांडायची असल्यामुळे त्यादिवशी आमची रोजची बस नव्हती. त्याऐवजी सिंगापूरच्या दोन सरकारी बसेस दिमतीला होत्या. 'सरकारी बसेस असल्यामुळे थोडं जमवून घ्या' असा सौ.शिंदेंचा सबुरीचा सल्ला होता. मनात म्हटलं - जास्तीतजास्त काय होईल? बसच्या खिडक्यांचे पडदे साधे असतील, सीट्स कमी गुबगुबीत असतील, ए.सी. वगैरे विशेष नसेल ....'सिंगापूरची सरकारी बस' ही काय चीज आहे ते सेंटोसाला पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आणि तसंच झालं - आपल्या आराम बसच्या पुन्हा एकदा तोंडात मारतील अश्या त्या दोन सरकारी बसेस आल्या. थोडं इकडे आणि थोडं तिकडे असं दोन्ही बसेसमध्ये सगळं सामान चढलं. तितक्यात, चेहेऱ्यावरून मराठी वाटणारे एक गृहस्थ शिंदे पतिपत्नींशी 'काय, कसं काय' करून पूर्वीची ओळख असल्यासारखे गप्पा मारत उभे असलेले दिसले. जरा आश्चर्य वाटलं. मग शिंदेंनी त्यांची ओळख करून दिली. आदल्या दिवशी आम्हाला मस्त पुणेरी, घरगुती जेवण पुरवणारे ते हेच - श्री. आपटे. आदल्या दिवशीचं जेवण कसं वाटलं हे विचारायला ते मुदाम आम्ही निघायच्यावेळी हॉटेलवर आले होते. मूळचे पुण्याचेच, पण गेली ८-१० वर्षं सिंगापूरमध्येच वास्तव्याला असलेले. त्यांचा तिथे तोच व्यवसाय आहे. साधं जेवण, सणासुदीचं जेवण, पूजेचं-मुंजीचं-होम हवनाचं साहित्य ते तिथे राहत असलेल्या भारतीय माणसांना पुरवतात. अगदी चौरंग, जानवी-जोड पासून भटजीपर्यंत सगळं. मनात आलं - एकतर यांनी एखादा भटजी नोकरीला ठेवला असेल किंवा स्वतःच भटजी बनून जात असतील ठिकठिकाणी! कारण चेहेऱ्यावरून पक्के 'ए'कारांत पुणेकर होते पण पक्के व्यावसायिकपण वाटत होते. सिंगापूरला येऊन हा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनात आलं यातच सगळं आलं. तो त्यांचा व्यवसाय तिथे इतका जोरदार चालण्यामागे सुध्दा मानवी स्वभावधर्मच आहे. आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
तर, त्यादिवशीसुध्दा प्रवासात आम्हाला जेवणाचे डबे मिळणार होते ते त्यांच्याकडूनच. ८-१० दिवस एकाच चवीचं मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर दोन दिवस ते घरगुती जेवण म्हणजे खरंच एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. तसंही, केवळ दोन दिवसांच्या वास्तव्यातच सिंगापूरने तरी दुसरं काय केलं होतं? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या पध्दतीने आम्हाला सुखद आश्चर्याचे धक्केच तर दिले होते. 'जीवन में एक बार आना सिंगापूर ...' हे अगदी खरं होतं!!! फक्त, ती ओळ अजून थोडी सुधारावीशी वाटली - 'जीवन में किमान आठवडाभर आना सिंगापूर'!!!
दोन दिवस तिथे सूर्यदर्शन झालेलं नव्हतं पण निघायच्या दिवशी मात्र सिंगापूरचा सूर्य पण आला निरोप द्यायला. निघाल्यावर साधारण अर्ध्या तासाने सिंगापूरच्या सीमेजवळ उतरलो. आमच्याबरोबरच आमचं सामानपण खाली उतरवण्यात आलं. आपापलं सामान घेऊन इमिग्रेशनच्या ऑफ़िसमध्ये जायचं होतं. म्हणजे प्रक्रिया सगळी विमानतळासारखीच, प्रवास फक्त बसचा होता. सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती. शिवाय 'चार तास आधी चेक-इन' ही भानगड नव्हती. आमच्या गृपपैकी एका काकूंचा 'मलेशिया व्हिसा' मिळाला नव्हता. ते काम होतं. पण सगळंच पटापट आणि थोडक्यात उरकलं. त्या ऑफ़िसमधून सगळे बाहेर आलो. आता पुढच्या प्रवासासाठी मलेशियाच्या दोन बसेस उभ्या होत्या. त्या बसेसही एखाद्या विमानाच्या 'बिझिनेस क्लास'च्या तोंडात मारतील अश्या होत्या - एकदम ऐसपैस आणि मस्त!! चला, म्हणजे आता पुढचा ४-६ तासांचा प्रवास एकदम आरामात होणार होता.

पुण्याहून मुंबईला जावं इतक्या सहजतेने आम्ही सिंगापूरहून मलेशियाला चाललो होतो. सिंगापूर, मलेशिया हे पूर्व आशियातले देश आहेत यापलिकडे त्यांच्या भौगोलिक स्थितीकडे आपण विशेष लक्ष देत नाही. नकाशा नीट बघितला तर लक्षात येतं की हे दोन्ही शेजारी देश आहेत. मध्ये एक खाडी आहे म्हणून नाहीतर त्यांचे भूभाग पण एकमेकांना जोडले गेले असते. खाडीवरचा एक-दीड कि.मी. लांबीचा पूल हा त्यांच्यातला एकमेव दुवा आहे. तो भलाथोरला पूल म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना होता पण त्याचं नाव मात्र अगदी साधं - नुसतं 'कॉज-वे'!!! बांधकाम सुरू असलेल्या आपल्या 'वरळी-वांद्रे सागरी मार्गा'चं मला कोण कौतुक, नाव पण किती छान, घसघशीत - वरळी-वांद्रे सागरी मार्ग! आणि हा पूल त्याच्या कितीतरी आधी बनलेला, तेव्हा कदाचित सामान्य माणसाला जास्त नवलाईचा वाटला असणार. त्याला एखादं भारदस्त नाव शोभून दिसलं असतं!! 'कॉज-वे' म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एखादा अरुंद, अगदी पाण्याजवळून नेणारा रस्ता आला होता.
असा तो 'कॉज-वे' ओलांडून आता आम्ही अजून एका नव्या देशात प्रवेश केला होता. मलेशियात प्रवेश केल्यावर आणि 'क्वालालंपूर - १७० कि.मी.' अश्या प्रकारच्या पाट्या दिसायला लागल्यावर मात्र सकाळची ती हुरहूर केव्हा मागे पडली ते कळलंही नाही. इथे घड्याळांतली वेळ बदलायचा वगैरे प्रश्न नव्हता - साधारण एकाच रेखावृत्तावर दोन्ही देश आहेत. मग रस्त्यावरच्या पाट्या वाचायला सुरूवात केली. पाट्यांवरची लिपी इंग्रजी पण भाषा मलाय होती. पण ते जरा बरं वाटलं. अर्थ नाही कळला तरी निदान शब्द तरी कळत होते; अगदीच थायलंडसारखी निरक्षराची गत नव्हती. ज्या ठिकाणी त्या पाट्या असायच्या त्यावरून अर्थाचा साधारण अंदाज बांधता यायचा.रस्ता एकदम निर्मनुष्य होता. मध्येच एखाददुसरी गाडी दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोगणती पामच्या झाडांची लागवड होती. मलेशियात प्रवेश केल्याकेल्या लगेचच त्या देशाचं वैशिष्ट्य म्हणून असलेली एक गोष्ट पहायला मिळाली आणि सिंगापूरप्रमाणेच मी मलेशियाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडले. रस्त्याला लागून पामची झाडं, थोड्या दूरवरपण पामची झाडं आणि लांबवर दिसणाऱ्या उंच डोंगरांवर पण पामचीच झाडं!! ते बघायला फारच छान वाटत होतं - अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं! काही वेळापूर्वी ती ऐसपैस बस पाहिल्यावर खरंतर मी एक मस्तपैकी झोप काढायचं ठरवलं होतं. पण त्या सुंदर पामच्या बागांनी माझी झोप कुठल्याकुठे पळवून लावली. तासाभरानंतर मुख्य रस्त्यावरून बस डावीकडे वळली. एके ठिकाणी १०-१५ मिनिटं थांबायचं होतं पाय मोकळे करायला. पामने मढलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलपाशी उतरलो. तिथे नुकताच पाऊस पडून गेला होता. ढगाळ, दमट हवा होती. तिथल्या स्वच्छतागृहांवर 'lelaki' आणि 'wanita' अश्या पाट्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की मलाय भाषेत 'पुरुष' आणि 'स्त्री' साठी अनुक्रमे 'lelaki' आणि 'wanita' हे शब्द आहेत. अर्थ कळल्यामुळे जाम आनंद झाला. पुढच्या दोन दिवसात मग मला तो नादच लागला - पाट्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधत बसायचं. १५-२० मिनिटांत सगळे ’लेलाकी’ आणि ’वनिता’ पुन्हा बसमध्ये चढले आणि तिथून निघाले.
पुन्हा तासभर प्रवास आणि पुन्हा एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. आपापले डबे घेऊन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शिरलो. आत शिरताक्षणी एक अत्यंत उग्र, कसातरीच वास नाकात शिरला. इतरवेळी अश्या वासाच्या ठिकाणी जेवणाची कल्पनाही सहन झाली नसती. पण त्या दिवशी नाईलाज होता. पामच्या झाडांप्रमाणेच या वासानेही पुढे दोन दिवस आमची पाठ सोडली नाही ... कारण तो वास पाम तेलाचाच होता!! इतक्या सुंदर झाडांच्या बियांपासून इतक्या घाणेरड्या वासाचं तेल निघतं?? अर्थात हा सवयीचा भाग होता. ज्या तेलाच्या वासाला मी नाकं मुरडत होते त्याच तेलात बनवलेले कसलेकसले पदार्थ तिथले लोक मिटक्या मारत खात होते. त्या लोकांच्या ताटांत आणि एकूणच तिथल्या काचेच्या कपाटांत जे-जे काही मांडून, टांगून, पसरून ठेवलेलं होतं ना ते शिसारी आणणारं होतं. नंतरच्या दोन दिवसांत मलाय पदार्थ चाखून पाहण्याची माझी इच्छा केव्हाच मेली होती. या सगळ्या पूर्व आशियाई राष्ट्रांत शाकाहारी माणसं फारच थोडी सापडतात आणि त्यांचा मांसाहार हा आपल्या कल्पनेपलिकडचा असतो. ते तसले पदार्थ तोंडात घालणं तर सोडाच, नुसते बघण्यासाठी पण मनाची बरीच तयारी करावी लागते.
आमचं जेवण चालू असतानाच तिथे एक मलाय कुटुंब आलं. त्यांतल्या ८-१० वर्षांच्या एका खट्याळ पोरानं आमच्या डब्यांत वाकून पाहिलं आणि जसं मी नाक मुरडलं होतं तसंच त्यानं आमच्या पुरी-भाजी, गुलाबजाम, दही-भात या जेवणाकडे बघून तोंड वाकडं केलं. तिथल्या तिथे फिट्टमफाट!! इतरही अनेक लोक आमच्या जेवणाकडे वळूनवळून पाहत होते. कदाचित मस्त, सुग्रास खेकड्याचं कालवण खाताना गोडेतेलाचा 'घाणेरडा वास' त्यांच्या नाकात शिरला असेल आणि त्यांच्या जेवणाची मजाच गेली असेल ...
दुसऱ्या बसमध्ये एक टूरिस्ट गाईड होती. तिने दिलेली प्राथमिक माहिती आमच्या सहप्रवाश्यांकडून कळली. मलाय भाषेत स्वागत करायचे असेल तर 'selamat datang' असं म्हणतात. ही अक्षरं तिथे हॉटेलमध्येही दिसली होती.
सकाळच्या प्रवासात मंडळींची एकएक डुलकी झालेली होती, आता जेवणंही झाली होती. तिथून निघाल्यावर मग बसमध्ये गाणी, गप्पा, जोक्स, नकला सुरू झाल्या. तो तास-दीड तास मजेत गेला.
संध्याकाळी क्वालालंपूर शहरात पोहोचलो. डावीकडच्या खिडकीतून लांबवर पेट्रोनास ट्विन टॉवर्स दिसले. मलेशियातली तेवढी एकच गोष्ट फक्त माहित होती, त्यामुळे सगळे 'बघू, बघू' करत डाव्या बाजूच्या खिडक्यांतून डोकावून पहायला लागले आणि एखादी नवलाईची गोष्ट सापडावी तसे खूष झाले. ते टॉवर्स पुढच्या दोन दिवसांत सतत दिसतच राहिले. जरा इकडे-तिकडे नजर वळवली की कुठेनाकुठेतरी दिसायचेच. पण त्या क्षणी ते माहिती नव्हतं. त्यामुळे आयुष्यातली ती जणू एक मोलाची संधी दवडण्याची कुणाची तयारी नव्हती.
त्यादिवशी आम्हाला क्वालालंपूरहून पुढे 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. 'गेंटींग हायलंड' - तिथलं एक प्रसिध्द थंड हवेचं ठिकाण - मलेशियाचं महाबळेश्वर!! क्वालालंपूर शहरात न शिरता बसने घाटरस्ता पकडला. जसजशी हवा गार-गार होत गेली, ढग-धुकं वाढायला लागलं, तसतसे ते पाम पांघरून बसलेले डोंगर अजूनच छान दिसायला लागले. वळणावळणाचा रस्ता पोटातल्या पाण्यात ढवळाढवळ करणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. माझं पाट्या वाचण्याचं काम सुरूच होतं. त्या रस्त्यावर सतत 'ikut kiri' अशी एक पाटी दिसत होती. २-३ दिवसांच्या संशोधना‍अंती त्याचा अर्थ 'Keep left' आहे असं लक्षात आलं. रंगरूप बदललं, देश-वेष बदलला तरी रहदारीच्या नियमांसारख्या काही गोष्टी लोकांच्या मनावर सतत बिंबवाव्याच लागतात. त्या बाबतीत जगभर एकवाक्यता दिसून येईल ... आणि त्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीतही!!
'गेंटींग हायलंड'च्या पायथ्यापाशी उतरलो तेव्हा दिवस पूर्णपणे बुडालेला होता. हवेत बोचरा गारवा होता. काहीजणांनी आपापले स्वेटर्स वगैरे बाहेर काढले. पुणेकरांचा गुलाबी थंडीबद्दलचा 'जाज्वल्य अभिमान' लगेच उफाळून आला. 'स्वेटर घातलेले सगळे मुंबईकर, न घातलेले सगळे पुणेकर' अशी थट्टा सुरू झाली. मुंबईकरांना नावं ठेवण्याची अशी नामी संधी पुणेकर थोडीच सोडणार होते ....
त्या पायथ्यापासून आम्हाला केबल कारने वर 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. ती आशिया खंडातली सर्वात मोठी केबल कार समजली जाते. गुडुप अंधारात, त्या एकमेव केबलच्या भरवश्यावर आमच्या निरनिराळ्या केबिन्सची वरात २००० मी. उंचीवरच्या त्या डोंगराच्या दिशेने निघाली. खाली उंचच्या उंच पर्जन्यवृक्षांचं निबिड अरण्य मिट्ट काळोखात एकदम भयाण वाटत होतं. 'Rain-forests of Malaysia ...' हे शब्द डिस्कवरीवरच्या कार्यक्रमांत अनेकदा ऐकले होते - तेच हे मलेशियातलं जगप्रसिध्द, घनदाट पर्जन्यवन. केबलला आधार देणाऱ्या मोठ्या खांबांजवळ तेवढा एखादा मिणमिणता दिवा असायचा. बाकी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं. अश्या ठिकाणी 'अचानक वीज गेली तर ...', 'काही बिघाड झाला तर ...' असल्या शंका हटकून मनात येतातच. केबिन्सच्या आतल्या बाजूला सुरक्षाविषयक सगळे नियम आणि सूचना लिहिलेल्या होत्या त्या आधी वाचून काढल्या. आदित्यला समजावून सांगितल्या. भीती अशी वाटत नव्हती पण नाही म्हटलं तरी अंधाराचा मनावर थोडा परिणाम झालेलाच होता. पण त्याबरोबरच हा प्रवास दिवसाउजेडी करायला तितकीच मजा येईल हे ही कळत होतं.
निसर्गावर मात करणं माणसाला कदापि शक्य नाही हे अश्या वेळेला पटतं. घनदाट जंगलातून उंच डोंगरावर सहजगत्या पोचण्यासाठी एक अत्याधुनिक वाहतुकीचं साधन उपलब्ध करणं म्हणजे कौशल्याचं काम होतं हे खरंच! माणसाच्या मेंदूला तिथे दाद ही दिलीच पाहिजे. पण म्हणून केवळ त्या बुध्दीच्या जोरावर निसर्गावर कुरघोडी करायचा कुणी आव आणत असेल तर निसर्ग त्याला अश्या ठिकाणी बरोब्बर त्याची जागा दाखवून देतो. शारीरिक इजा पोहोचू नये म्हणून खबरदारीचे अनेक उपाय योजता येतात पण त्या जीवघेण्या शांततेत, काळोखात बुडलेल्या दाट जंगलात हे पण कळून चुकतं की माणूस हा त्या सर्वशक्तिमान निसर्गाच्या दृष्टीने इतर किडा-मुंग्यांसारखाच!!
त्या अर्ध्या तासात मध्ये काही काळ तर असा होता की मागचं दिसेनासं झालं होतं आणि पुढची लोकवस्तीची चिन्हं दिसायला अजून वेळ होता. त्या अंधाराच्या साम्राज्याच्या दोन्ही टोकांना मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. थोड्या वेळानंतर वर लांबवर दिवे लुकलुकायला लागले. ३०-३५ मिनिटं ती तशी लटकत मार्गक्रमणा केल्यावर आम्ही उतरलो.
एखाद्या पर्यटनस्थळी जशी संध्याकाळच्या वेळी माणसांची गजबज, दिव्यांची रोषणाई वगैरे असते तशीच तिथे होती. हॉटेलच्या खोल्या ताब्यात घेतल्या, सामान टाकलं आणि जेवणासाठी पुन्हा बाहेर एकत्र जमलो. जेवणाचं ठिकाण तिथून थोडं लांब होतं. म्हणजे त्याच परिसरात होतं पण चालत जायला १५-२० मि. लागायची. आणि ते चालत जाणं म्हणजे सुध्दा प्रत्यक्ष चालणं कमी आणि सरकत्या जिन्यांवरून वर-खाली करणं जास्त होतं. त्या रिसॉर्टचे जमिनीखाली आणि वर मिळून जवळजवळ १२-१५ मजले होते. जेवणाचं ठिकाण सातव्या मजल्यावर होतं. आता तो सातवा मजला म्हणजे सुध्दा एकूणातला सातवा की जमिनीवरचा सातवा की जमिनीखालचा सातवा हे शेवटपर्यंत कळलं नाही. पण जवळजवळ ६-७ सरकत्या जिन्यांवरून सरकून (वर की खाली ते ही आता आठवत नाहीये!!) गेल्यावर आम्ही त्या जेवायच्या ठिकाणी पोहोचायचो. माझी तर दरवेळी त्या सरकत्या जिन्यांची मोजदाद चुकायची. पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात' मध्ये कसा तो 'गरूडछाप तपकीर'वाला पु.लं.ना सांगतो - 'दोन डोंगर चढायचे, दोन उतरायचे - पायथ्याशी गावडेवाडी' तसंच काहीसं होतं तिथे - ४-६ सरकते जिने चढायचे, ७-८ उतरायचे, पायथ्याशी जेवण!! काय गंमत आहे ना ... कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच. मलेशिया हा जेव्हा अजून मलेशिया झालेला नव्हता तेव्हाचाही - पु.लं.च्या 'पूर्वरंग'तून माहिती होताच की!! म्हणजे मलाय देश आणि पु.ल. ही जोडी अगदीच विजोड नव्हती ...

रात्री १० च्या सुमाराला हॉटेलवर परतलो. घरातून निघाल्यापासून प्रथमच जरा सुखद थंडी अनुभवायला मिळत होती. ट्रीपला जायचं ठरल्यावर ती ठिकाणं थंड हवेची नाहीत म्हणून आदित्य सुरूवातीला थोडा खजील झाला होता. तो त्या थंडीमुळे जरा खूष झाला. त्याला आता दुसऱ्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती कारण तिथला दुसरा दिवस हा त्याच्या वयाच्या मुलांच्या खास आकर्षणाचा असणार होता.
चार भिंतींतल्या सुरक्षित अंधारात सगळे झोपेच्या अधीन झाले. हा अंधार आणि काही तासांपूर्वीचा तो जंगलातला भयाण अंधार - दोन्हीत किती फरक होता .... !!!

 थीम-पार्कमध्ये एक दिवस ...

आदल्या दिवशी आम्ही 'गेंटींग हायलंड'ला पोचलो तोवर रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आधी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघितल्याशिवाय मला करमलंच नसतं. सकाळची वेळ, सूर्याची कोवळी किरणं, थंडी, धुकं, हिरव्या डोंगरदऱ्या यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ना त्याला केवळ 'लाजवाब' हाच एक शब्द योग्य आहे - मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा! त्यावेळची ती गार, ताजी-ताजी हवा नाकात भरून घ्यायला मला फार आवडते.
आमच्या खोलीच्या खिडकीतून हॉटेलचा परिसर दिसत होता. तिथली बाग, रस्ते काही अंतरानंतर धुक्यात हरवून गेलेले होते. लांबवर तर डोंगरसुध्दा धुक्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपल्यासारखे वाटत होते. आमच्यापैकी एक-दोन काका बागेतल्या रस्त्यावरून फिरायला निघालेले दिसले. मला हे कसं सुचलं नाही कोण जाणे. खरंतर मला पहाटे लवकर उठणं अजिबात जमत नाही आणि आवडतही नाही. पण अश्या काही मोजक्या कारणांसाठी मात्र मी पहाटे उठायला सुध्दा एका पायावर तयार असते. सकाळी फिरायला जाण्याचा बेत दुसऱ्या दिवशी अमलात आणायचा ठरवला आणि तो आईला सांगायला घाईघाईने तिच्या खोलीत गेले. ती माझी वाटच पाहत होती कारण तिच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारं दृश्य तिला मला दाखवायचं होतं. मी सुध्दा अगदी जोरात 'हो, मी पण पाहिलं सकाळी उठल्याउठल्या ...' असा भाव मारत पडदे सारले और मेरी तो बोलती ही बंद हो गयी कारण मी जे आधी पाहिलं होतं ते यापुढे काहीच नव्हतं!! इथे हॉटेलचा परिसर, रस्ते-बिस्ते काही नाही .... नजर जाईल तिकडे पामवृक्षांच्या काळपट-हिरव्या रंगात रंगलेल्या डोंगररांगा आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण रंगसंगती साधत तरंगणारा धुक्याचा शुभ्र कापूस .... बस्स!!

4050-06.jpg

त्याच धुक्याच्या मागे आदल्या दिवशी भयाण वाटलेलं ते जंगल पसरलेलं होतं हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. बऱ्याच वर्षांनी दिवसाची अशी अप्रतिम सुरूवात झाली होती. कारण, इथे वापीत राहून असं धुकं-बिकं सगळं विसरायलाच झालंय आता....

पण आदित्यच्या दृष्टीने मात्र दिवसाची सुरूवात 'डोकं पकवणारी' झाली होती. तो सबंध दिवस आम्हाला तिथल्या थीम-पार्क मध्ये घालवायचा होता. साहजिकच त्यादिवशी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं कोण तयार झालं असेल तर आदित्य. कधी एकदा त्या थीम-पार्कचे दरवाजे उघडताहेत आणि आत घुसून तो तिथल्या वेगवेगळ्या राईड्सवर उलटापालटा, वरखाली, गोलगोल फिरायला सुरूवात करतोय असं त्याला झालं होतं. नेहेमीप्रमाणे नाश्त्याच्या ठिकाणी तो आमच्याआधी पोचला होता. जरा वेळाने मी तिथे गेले तर याचा चेहेरा पडलेला! समोर सगळे आवडीचे पदार्थ असताना आता हे काय नवीन ते मला कळेना. विचारल्यावर 'पाऊस पडतोय बाहेर' म्हणून माझ्यावरच डाफरला. मग मला उलगडा झाला. बाहेर पाऊस म्हणजे तो थांबेपर्यंत तरी त्याला तसं उलटंपालटं होता येणार नव्हतं. वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं. आता ती काही माझी चूक नव्हती. पण त्यानं त्याचा सगळा राग माझ्यावर काढला!!
... हवा किती झपाट्यानं बदलली होती! बोचरा गारवा होता म्हणून, नाहीतर मी आदित्यला घेऊन पावसात भिजायला नक्की गेले असते. पण आता नाईलाजास्तव इकडेतिकडे वेळ काढावा लागणार होता. मग आम्ही सगळेजण त्या रिसॉर्टच्या ४-५ मजल्यांवरून फेरफटका मारून आलो. सगळीकडे शॉपिंग मॉल्स, प्रदर्शनं, तरतऱ्हेच्या वस्तूंची दुकानं, उपहारगृहं अशी सरमिसळ होती. तिथे सुध्दा कुठून आलो, कुठे वळलो, किती मजले चढलो-उतरलो - काही म्हणता काही कळलं नाही. जमिनीच्या वर होतो की खाली ते ही लक्षात आलं नाही. 'तिथून पुन्हा आपापल्या खोल्यांपाशी परत जा' असं सांगितलं असतं तर कुणालाही ते जमलं नसतं. आमचा गाईड - झॅक - त्याच्यावरच आमची सगळी मदार होती. त्याच्या मागेमागे तिथे तसं फिरण्यात वेळ मात्र मस्त गेला आमचा .... आदित्य सोडून! त्याला एव्हाना 'आयुष्य व्यर्थ' वगैरे वाटायला लागलं होतं!! 'काही अर्थ नाही मलेशियाला येण्यात ...' इतपत विरक्ती पण आलेली होती....उरलासुरला राग काढायला आई होतीच!!! तासाभरानंतर मात्र पावसाला त्याची दया आली. लगेच त्याची कळी खुलली.

थीम-पार्कच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाच्या मनगटावर एकएक कागदाचा, barcode असलेला पट्टा गुंडाळला गेला. तो त्या पार्कचा Multiple Entry Visa होता. त्याचा अर्थ आदित्यला सांगितल्यावर तो तर नाचायचाच बाकी राहिला होता. कितीही वेळा आतबाहेर करा, कुठल्याही राईड्सवर कितीही वेळा बसा - आता त्याला कुणीही अडवणार नव्हतं - अगदी आईसुध्दा!! बॅंकॉकपासूनच तो जोशी काका-काकू आणि पूर्वाताईबरोबरच असायचा बहुतेकवेळा. त्याची आणि पूर्वाताईची एव्हाना भलतीच गट्टी जमली होती. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा एकदा त्या थीमपार्कमध्ये शिरल्यावर तो त्यांच्याबरोबर जो गायब झाला माझ्यासमोरून तो थेट रात्री जेवायच्यावेळी पुन्हा भेटला मला. दिवसभर फक्त अधूनमधून कुठेतरी माझ्या दृष्टीस पडायचा, मध्येच कधीतरी त्याची हाक ऐकू यायची नाहीतर आवाज कानावर पडायचा इतकंच!

उच्च रक्तदाबवाल्यांना कुठल्याही राईड्सवर बसायला बंदी होती. त्यामुळे आईची इच्छा असूनही तिला कशात बसता आलं नाही. सासूबाईंना तिथला गारठा सहन झाला नाही. त्यांना थंडी वाजून ताप भरला. त्यामुळे त्या गोळी घेऊन खोलीत झोपून राहिल्या. बाबा मात्र अर्धा दिवस होते आमच्याबरोबर. तो दिवस माझ्या विशेष लक्षात राहिला त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच 'रोलर कोस्टर' नामक प्रकारात बसले. रोलर कोस्टरचं लहान रूप म्हणता ये‍ईल अशी एक राईड आधी दिसली, त्याच्यापासून सुरूवात करायचं ठरवलं. त्यात बसल्यावर आपल्याला मळमळलं नाही, पोटात ढवळलं नाही हे पाहून माझा उत्साह वाढला. मग मोठ्या रोलर कोस्टरवर बसायचं धाडस केलं. तिथे दोन ठिकाणी ३६० अंशात गिरकी घ्यायची होती. आधी २५-३० फ़ूट उंची गाठेपर्यंत मजा वाटली. पण खालच्या दिशेने जोरात निघाल्यावर मात्र वाट लागली. त्या वेगाचा, अचानक वळणांचा त्रास कमी करायचा असेल तर बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडावं असं मी एकदा कुठेतरी वाचलं होतं. पण हा गृहपाठ न करता जरी मी गेले असते तरी चाललं असतं कारण ऊर्ध्व दिशा बदलून अचानक एका क्षणी जेव्हा आपण खालच्या दिशेनं वजनविरहित अवस्थेत तुफान वेगात निघतो तेव्हा ओरडण्याशिवाय गत्यंतरच नसतं!! त्यात पुन्हा मी माझे डोळेही घट्ट मिटून घेतले होते. मधली ती ३६० अंशाची दोन वळणं येऊन गेलेली आता अंधूक आठवताहेत मला... पण काही सेकंदांनंतर थांबल्यावर मात्र मेंदूत प्रचंड वावटळ येऊन गेल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ!! पण मी खूष होते. कारण, इतके दिवस ज्या राईड्सकडे नुसतं पाहून मला पोटात ढवळायचं त्यांपैकी एका रोलर कोस्टरसारख्या महारथी राईडमध्ये त्या दिवशी मी चक्क बसले होते, ओरडले होते, हवेत गटांगळ्या खाल्या होत्या, गिरक्या घेतल्या होत्या .... मजा आली, त्रास झाला नाही पण का कोण जाणे, पुन्हा त्यात बसावंसंही वाटलं नाही. मात्र आधी द्विगुणित झालेला माझा उत्साह आता दशगुणित झाला होता. आता जरा आव्हानात्मक, उच्च्पदस्थ राईड्सकडेच माझं लक्ष जायला लागलं. एक Space Shot नामक राईड होती. एका ४०-५० फ़ूट उंच खांबावरून आपण बसलेला पाळणा खूप वेगाने वर खाली होतो. क्षणार्धात २५-३० फ़ूट वर, क्षणार्धात खाली .... बाकी काही नाही तरी दुपारनंतर त्या राईडमध्ये बसायचंच असं मी ठरवून टाकलं.

मी आणि बाबांनी आदित्यला आग्रह करून Go Carting ला पण नेलं. तो आधी तयार नव्हता - कदाचित चार चाकी गाडी चालवायची होती म्हणून असेल. तिथल्या त्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे खऱ्या गाड्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती होत्या. मारे अगदी F-1 च्या थाटात आम्ही हेलमेट घालून गाडीत बसलो, सीट-बेल्ट्स लावले ... आदित्यसाठी तर ते सगळं एकदमच रोमांचकारी होतं. सगळ्यांची पूर्वतयारी होईपर्यंत अगदी शिस्तीत सिग्नलचा लाल दिवा वगैरे चालू होता. तो हिरवा झाल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक 'शूमाकर' संचारला. पण त्या भ्रमाचा भोपळाही लगेच फुटला कारण कितीही केलं तरी त्या गाड्यांचा वेग १०-१५ च्या पुढे जातच नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनंच तशी तजवीज केलेली असणार म्हणा. १-२ फेऱ्या मारल्यावर मला आणि बाबांना तर कंटाळाच आला पण अर्ध्यातच थांबायला परवानगी नव्हती ... झक्कत त्या ४-५ फेऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. आदित्यला मात्र खूपच मजा आली....

अर्धा दिवस संपत आला होता. आम्ही इकडेतिकडे भटकत होतो, मध्येच मनात आलं की एखाद्या राईडमध्ये बसत होतो .... त्या राईड्सप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, ते तसं वयाचं, वेळेचं बंधन नसणं त्यादिवशी जास्त भावलं मला. दुपारी दोन वाजता इतरांबरोबर जेवायला जाणं मात्र अपरिहार्य होतं - ते सुध्दा वेळेचं बंधन म्हणून नव्हे तर नंतर एकट्याने गेलो असतो तर रस्ता सापडला नसता म्हणून...!!

जेवणानंतर सगळ्या आजी-आजोबांनी वामकुक्षीला प्राधान्य दिलं आणि आमच्यासारखे मात्र निघाले पुन्हा हुंदडायला. सकाळच्या त्या कोवळ्या किरणांनंतर दिवसभर सूर्य काही दिसला नाही. खूप धुकं होतं, गारठा होता पण तेच बरं होतं. स्वच्छ आकाश आणि कडक ऊन असतं तर मला वाटतं मी पण खोलीत बसून राहणं पसंत केलं असतं. लांबून Space Shot खुणावत होतं पण भरल्यापोटी लगेच कसं काय बसणार त्यात! मग एका निवांत ट्रेनमधून एक मोठी फेरी मारली, तिथल्या 'ग्रीन हाऊस'मध्ये पानं-फुलं बघत थोडा वेळ काढला. एका दुकानातून कॉफ़ीचा वास दरवळत आला. मग मस्त वाफाळती कॉफ़ी प्यायलो. तिथेच मक्याचे उकडलेले दाणे पण मिळाले गरमागरम. मजा आली ते पण खायला ...
अचानक वारा खूप जोरात वाहायला लागला, धुकं अजून दाटदाट व्हायला लागलं, गारठ्याचा बोचरेपणा अजूनच वाढला आणि एकएक करत सगळ्या राईड्स अपुऱ्या प्रकाशामुळे आणि धुक्यामुळे बंद झाल्या!!! नंतर सहा वाजेपर्यंत वाट पाहिली पण एकदोन अपवाद वगळता त्या पुन्हा सुरू नाही झाल्या. Space Shot मध्ये बसण्यासाठी एकवटलेला धीर सरळसरळ वाया गेला...!! पण आता त्याला काही इलाज नव्हता.

संध्याकाळनंतर तिथला 'कॅसिनो' बघायला जायचं होतं. वयोमर्यादा आणि वेशभूषा मर्यादा यांमुळे आदित्य आणि अजय दोघंही तिथे येऊ शकले नाहीत. पुरुषांसाठी लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घालणं आवश्यक होतं. तसा शर्ट नव्हता म्हणून अजय आणि १२ वर्षांखालील मुलांना आत प्रवेश नव्हता म्हणून आदित्य...!! वयोमर्यादा समजण्यासारखी होती पण जुगारच खेळायचा तर लांब बाह्या काय आणि अर्धी चड्डी काय - काय फरक पडणार होता कोण जाणे!! त्या दोन अटींत बसणारे इतर सगळे मग त्या कॅसिनोतून फिरून आलो. मला स्वतःला सुध्दा त्यात विशेष स्वारस्य होतं अशातला भाग नाही पण 'नाहीतर अश्याठिकाणी आपण जायची वेळ तरी कधी येणार' या शुध्द हेतूनं मी तिथे गेले होते.
तो जगातला सर्वात मोठा कॅसिनो आहे. दूरदेशातले लोक गेटींग हायलंडला केवळ त्या कॅसिनोसाठी येतात असं कळलं. तीन मजल्यांवरच्या मोठमोठ्या दालनांत निरनिराळ्या प्रकारांचे जुगार अगदी रंगात आले होते. छतावर लटकणारी प्रचंड झुंबरं आणि एकूणच प्रकाशयोजना अप्रतिम होती. उंची दारूचे ग्लास, सिगारेटी, लोकांचे वेष - सगळ्यांतून श्रीमंती नुसती ओसंडून वाहत होती. काहीही शारिरीक कष्ट न करता, बसल्याजागी, केवळ नशिबावर हवाला ठेवून पैसे कमवण्याची माणसाची वृत्ती अजबच म्हणायला हवी. आपल्यासारख्या नोकरी-धंदा करून, दिवसभर खपून भविष्याची चिंता करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तिथली ती गर्दी पाहून 'आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत' अशी शंका सुध्दा ये‍ईल कदाचित!! जुगार खेळणाऱ्यांच्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. मी एक-दोन टेबलांपाशी थोडा वेळ थांबून इमानदारीत समोर काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ओ की ठो कळलं नाही. बरं, सगळे व्यवहार शांतपणे चाललेले. त्यामुळे कानावर पडणाऱ्या शब्दांतून काही आकलन व्हावं तर ते ही नाही!! मला तिथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या त्या खोट्या नाण्यांची वर्गवारी करणारी यंत्रं!! त्या यंत्रात नाणी टाकली की क्षणार्धात दुसऱ्या बाजूने त्या-त्या नाण्यांच्या किंमतींप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट बनून बाहेर यायचे. तेच पहायला नंतर मला जास्त मजा आली. थोड्या वेळानं मात्र त्या सिगारेटचा धूर भरून राहिलेल्या खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखं व्हायला लागलं.... 'उंची वातावरणात मध्यमवर्गीयांचा जीव गुदमरतो' हे विधान शब्दशः खरं ठरलेलं पाहून मला हसू आलं!!

रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. पुन्हा एकदा अनेक सरकत्या जिन्यांवरून वर-खाली सरकून रेस्तरॉंपाशी पोचलो. प्रवेशद्वारापाशीच एका भिंतीला लागून अनेक उंच, पारदर्शक बाटल्यांमध्ये मसाल्यांचे निरनिराळे जिन्नस भरून ठेवलेले होते - नुसते देखाव्याला. आदल्या दिवशी जेवायला गेलो तेव्हा तिकडे लक्ष गेलं नव्हतं. एखाद्या रेस्तरॉंच्या अंतर्गत सजावटीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. बघायला खरंच छान वाटलं.

... मलेशियात येऊनसुध्दा चोवीस तास उलटून गेले होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर 'एक दिवस थीम पार्कमध्ये' या गोष्टीबद्दल आधी मी म्हणावी तेवढी उत्सुक नव्हते. दिवसभर आदित्य मजा करेल आणि आपल्याला फक्त त्याच्या मागेमागे फिरावं लागेल अशी काहीशी माझी कल्पना होती. पण चोवीस तासांनंतर माझं मत पूर्णपणे बदललेलं होतं. आदित्यच्या बरोबरीनं आम्ही पण तेवढीच धम्माल केली होती....आणि एक गोष्ट नक्की होती - जसा पॅरासेलिंगचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार होता तसाच हा थीम पार्कमधला एक दिवस आदित्य कधीही विसरणार नव्हता....!!!

 ट्विन टॉवर्सची दिवसभर सोबत ...

दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली की सबंध दिवस छान जातो असं म्हणतात. सलग तेरा दिवस प्रसन्न सुरूवात आणि छान दिवस - ही म्हणजे एक जंगी मेजवानीच होती. बरं, रोज त्या प्रसन्नतेचे वेगवेगळे प्रकार! आता त्यादिवशीचंच बघा ना... आदल्या दिवशी खिडकीतून दिसलेल्या विहंगम दृश्यानं समाधान झालं नव्हतं जणू, म्हणून त्या दिवशी सुध्दा उठल्याउठल्या पुन्हा पडदे सारून बाहेर नजर टाकली. धुकं खूप कमी दिसलं. पण त्यामुळे आधी न दिसलेली एक गोष्ट अचानक समोर आली!! चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि आदल्या दिवशी धुक्यात लपलेलं क्वालालंपूर शहर!! साताऱ्याहून येताना कात्रजचा बोगदा ओलांडला की कसं अचानक पुणे शहर समोर लुकलुकायला लागतं - अगदी तसंच! मग आम्ही निरनिराळ्या खिडक्यांतून डोकावून बघण्याचा सपाटाच लावला. हॉटेल-लॉबीच्या एका खिडकीतून पूर्वानं लांबवर 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' आणि 'के. एल. टॉवर' पण शोधून काढले. पुढचा अर्धा तास मग त्या खिडकीतून फ़ोटो काढण्यासाठी सगळ्यांची रांगच लागली.

त्या दिवशीची पहिली आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे 'दिवसाचा 'केबल कार'चा प्रवास'. आदल्या दिवशी करकरीत तिन्हीसांजेला त्या काळ्याकुट्ट जंगलानं मनावर जे दडपण आणलं होतं ना ते मला झुगारून द्यायचं होतं. त्या जंगलाची ती तशी आठवण मला पुसून टाकायची होती आणि झालंही तसंच.
ते घनदाट पर्जन्यवन आता सकाळच्या कोवळ्या, प्रसन्न उन्हात फारच देखणं वाटत होतं. 'अचानक होणाऱ्या बिघाडा'चा विचारही शिवला नाही मनाला ... कारण कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी अतिशय उत्कृष्ट यंत्रणा उभी केलेली दिसत होती आणि निसर्गदृश्याचं वर्णन काय करावं...!! 'हिरव्या रंगाची मुक्त उधळण' वगैरे शब्द थिटे पडले असते!! जोपर्यंत निसर्गाशी केवळ अश्या रसग्रहणापुरता संबंध ये‍ईल तोपर्यंत असेनात का सगळी माणसं त्याच्यादृष्टीनं किडा-मुंग्यांसारखी!!

4050-10.jpg

.... परतीचा तो प्रवास आदल्या दिवशीपेक्षा फारच पटकन झाल्यासारखा वाटला. आदित्यच्या दृष्टीनं मात्र थीम-पार्क, केबल-कार वगैरे सगळं केव्हाच भूतकाळात जमा झालं होतं कारण आमची बस आता 'चॉकोलेट फ़ॅक्टरी'च्या दिशेनं निघाली होती!

त्या चॉकोलेट फ़ॅक्टरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे केवळ शाकाहारी चॉकोलेट्स बनवली आणि विकली जातात. 'चॉकोलेट फ़ॅक्टरी' नावावरून वाटलं होतं की चॉकोलेट्स बनवण्याची प्रक्रिया पहायला मिळेल. पण प्रत्यक्षात आम्ही गेलो ते चॉकोलेट्सच्या दुकानात. सुरूवातीलाच, तिथल्या एका विक्रेत्याने सगळ्यांना खूष करून टाकलं - मलेशियन उच्चारांच्या इंग्रजीत माहिती देताना आम्हाला चक्क २-३ हिंदी वाक्यं ऐकवली. ती सुध्दा उगीच इकडची तिकडची नाहीत तर कुठली चॉकोलेट्स स्वस्त पडतील ते मुद्दाम हिंदीत सांगितलं. आधीच शाकाहारी चॉकोलेट्स म्हटल्यावर तमाम जोशी, परांजपे, छत्रे मंडळी सरसावली होती; त्यात आता स्वस्त चॉकोलेट्स कुठली ते ही कळलं. मग आदित्यची काय कथा... सगळ्या मोठ्या माणसांनासुध्दा 'हे घेऊ की ते घेऊ' असं झालं होतं. एकदा त्या चॉकोलेट्सची खरेदी झाल्यावर आदित्यच्या दृष्टीनं सहल 'सुफळ संपूर्ण' झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस तो 'आता उरलो उपकारापुरता' अश्या अविर्भावातच वावरत होता.
अर्ध्या-पाऊण तासानं, त्या दुकानाचा भरपूर फायदा करून दिल्यावर तिथून निघालो. गेंटिंग हायलंड परिसराला टा-टा करून आमची बस आता क्वालालंपूरच्या दिशेनं निघाली. उरलेला दिवस 'क्वालालंपूर दर्शना'चा कार्यक्रम होता.

प्रथम घड्याळांच्या एका मोठ्या दुकानात गेलो. Window Shopping आणि खरंखुरं shopping यात तासभर घालवून मग प्रसिध्द Batu Caves पहायला गेलो.
वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत उभ्या असलेल्या डोंगरांत नैसर्गिकरीत्या त्या क्षारांच्या गुहा तयार झालेल्या आहेत. काही-शे वर्षांपूर्वी त्यांचा शोध लागला. मग तिथे कार्तिकस्वामींचं देऊळ बांधण्यात आलं. जगातलं ते एकमेव असं कार्तिकस्वामींचं देऊळ आहे की जिथे स्त्रियांनाही प्रवेश आहे म्हणे. २७० पायऱ्या चढून गेल्यावरच ते दुर्लभ दर्शन होणार होतं. खरंतर असल्या भेदभावांची मला मनस्वी चीड आहे. पण पुन्हा एकदा मी स्वतःलाच समजावलं की 'देऊळ बघायला' म्हणून जायचंच नाही. त्या‍ऐवजी 'निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार' पहायला म्हणूनच जायचं.
ती पायऱ्यांची संख्या ऐकूनच अर्ध्याअधिक आजी-आजोबांनी माघार घेतली. बाकीच्यांनी गिर्यारोहण सुरू केलं. आमच्या सहाजणांपैकीही दोनच गडी होते त्यांत - मी आणि आदित्य. पायथ्यापाशी कार्तिकस्वामीचा अतिभव्य आणि उंचच्या उंच, उन्हात लखलखणारा सोनेरी रंगाचा पुतळा उभा होता. पुतळ्याच्या शेजारूनच पायऱ्या वर जात होत्या. २७० ही संख्या आधीच कळली असल्यामुळे मारे अगदी उत्साहात मी पायऱ्या मोजायला सुरूवात केली होती आणि पाचच मिनिटांनी दमून, घामेघूम हो‍ऊन जेव्हा पाणी पिण्यासाठी थांबले तेव्हा काही मिनिटांपूर्वी आपण कशाचीतरी मोजदाद करत होतो हे विसरूनही गेले होते! पायऱ्या उंच असल्यामुळे खूप दम लागत होता शिवाय ऊनही खूप होतं.
.... पण, १५ मिनिटांनी जेव्हा वर पोचले आणि त्या गुहांचा दर्शनी भाग जेव्हा दृष्टीस पडला तेव्हा इतके कष्ट घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ...

4050-17.jpg

अनंत काळापासून जमत आलेले क्षार आणि त्यांपासून बनलेले तिथले चित्रविचित्र आकार खरंच थक्क करणारे होते. दोन दिवसांत दुसऱ्यांदा निसर्गापुढे नतमस्तक होण्याची वेळ आलेली होती. प्रत्यक्ष देवळापाशी पोचायला पुढे थोडं चालत जायचं होतं. 'गुहा' म्हटल्यावर जे डोळ्यांसमोर ये‍ईल त्यापेक्षा तो अंतर्भाग खूपच मोठा होता - जवळजवळ ३-४ मजली उंचीचा आणि ४०-५० फ़ूट रुंदीचा!! देवळांच्या गाभाऱ्याबाहेर एखादा सभामंडप असतो. तिथे त्याची गरजच नव्हती कारण एवढा प्रचंड नैसर्गिक सभामंडप आपणहूनच तिथे हजर होता. काही ठिकाणी तर डोंगरांना लहानमोठी आरपार भगदाडं पडलेली होती. म्हणजे उजेडाचा प्रश्नही मिटला. कडेकपारींमधून साचलेलं पाणी तिथून खाली सांडत होतं. कडक उन्हाच्या आणि काळ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर ते पाण्याचे थेंब अक्षरशः मोत्यांसारखे भासत होते. इतरांना देवदर्शनानं जेवढं समाधान मिळालं त्याहूनही कणभर अधिकच मला मिळालं तिथले हे असे निसर्गाचे सगळे चमत्कार बघून!!! नाईलाजास्तव खालीच थांबलेल्या आमच्या म्हाताऱ्या मंडळींसाठी म्हणून मी भरपूर फ़ोटो काढले की दुधाची तहान निदान त्यांना ताकावर तरी भागवता यावी ...

अर्ध्या तासानं उन्हातून थकून-भागून खाली उतरलेल्या मंडळींची क्षुधाशांती करायला एक शहाळंवाला हजर होताच आणि तो ही आदित्यनंच शोधून काढलेला ... त्याच्याकडचे नारळही बॅंकॉकसारखेच - मोठे, जड, पसरट आणि बाहेरून पांढऱ्या रंगाचे.

तिथून जायचं होतं के. एल. टॉवर पहायला ... किंबहुना के. एल. टॉवरवरून संपूर्ण क्वालालंपूर शहर पहायला. निसर्गनिर्मित चमत्कार पहायला २७० मानवनिर्मित पायऱ्या चढून झाल्या, आता मानवनिर्मित चमत्कार पहायला 'लिफ़्ट' सारख्या अजून एका मानवनिर्मित चमत्काराच्याच मदतीने हजार-बाराशे फ़ूट उंची गाठायची होती. के. एल. टॉवरच्या Observation Deck वर आम्ही जाणार होतो. दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जगातल्या पाच सर्वात उंच टॉवर्समध्ये तो गणला जातो. हजार फ़ूट उंचीवरच्या Observation Deck वर नेण्यासाठी चार मोठ्या लिफ़्ट्स होत्या. आम्ही घड्याळ लावून पाहिलं - अक्षरशः एका मिनिटाच्या अवधीत आम्ही ती उंची गाठली होती!!
नावाप्रमाणेच आसपासचा परिसर न्याहाळण्याची ती जागा होती. चहूबाजूंना काचेच्याच भिंती होत्या. खाली विस्तीर्ण पसरलेलं शहर दिसत होतं.... आणि समोरच जणू एखादी शेजारची इमारत दिसावी तसे 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' दिसत होते. अगदी जवळ - शंभर पट Zoom-in केल्यासारखे!!! त्यांचं धातूचं बाह्य चंदेरी आवरण उन्हात चमचम करत होतं. त्यांच्यासमोर इतर उत्तुंग इमारती खुज्या वाटत होत्या.
अर्धा तास तिथे होतो, बरंच काही डोळ्यांत साठवायचा प्रयत्न केला. पण हळुहळू, त्या हजार फ़ूट उंचीवरसुध्दा पोटात भुकेमुळे तेवढाच खोल खड्डा पडायला सुरूवात झाली होती. तुम्ही हजार फ़ूट उंचीवर असा किंवा जमिनीखालच्या एखाद्या खोल खाणीत असा ... शरीराचं घड्याळ टिकटिक करत भुकेच्या, झोपेच्या वेळांची जाणीव करून देण्याचं थांबवत नाही!

त्या टॉवरच्या तळमजल्यावरच्या रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. मिनिटभराच्या आत लिफ़्टनं पुन्हा 'जमिनीवर' आलो. रेस्तरॉ रिकामं होतं आणि गरमागरम जेवण आमची वाट बघत होतं. जोडीला कांदा-भजी, गोडाचा शिरा आणि मुख्य म्हणजे दही होतं मस्तपैकी!! सगळ्यांनी आडवा हात मारला ते सांगायला नकोच - विशेषतः शिऱ्याचं भांडं तर पटापट रिकामं होत होतं.

जेवणानंतर निघालो. पेट्रोनास टॉवर्सपाशी फक्त फ़ोटो काढायला थांबायचं होतं. दरम्यान ढग भरून आले होते आणि भुरभूर पाऊस पडायला सुरूवात झाली होती ..... चुटपुट क्र. तीन!! पावसात फ़ोटो काढायला बसमधून उतरावं की नाही ते ठरेना थोडा वेळ. मी आणि अजय उतरलोच शेवटी आणि तेच बरं झालं, नाहीतर इतर उतरलेल्या लोकांनी काढलेले फ़ोटो नंतर पाहून 'चुटपुट क्र. चार' व्हायला वेळ लागला नसता.... कसेबसे १-२ फ़ोटो काढले घाईघाईत आणि फार भिजायच्या आत पळत पुन्हा बसमध्ये चढलो. निरनिराळ्या कोनांतून त्या टॉवर्सची उंची टिपायची इच्छा मात्र अपूर्णच राहिली....

4050-26.jpg

त्या दोन्ही टॉवर्सच्या ४१व्या आणि ४२व्या मजल्यांना जोडणारा एक पूल आहे. पर्यटकांना तिकीट काढून त्या पुलापर्यंत जाता येतं आणि त्यासाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागतात असं कळलं. सांगायचा मुद्दा म्हणजे काही मिनिटांपूर्वी 'चुटपुट क्र. चार' टाळल्याच्या माझ्या आनंदावर ताबडतोब विरजण पडलं होतं....

भुरभुरणाऱ्या पावसातून बसमधूनच गाईडनं 'हायकोर्ट, ब्रिटीशकालीन फ़ुटबॉल मैदान' इ. २-३ ठिकाणं दाखवली. बस जसजशी वळणं घेत होती तसतसे ते ट्विन टॉवर्स कधी उजवीकडे, कधी डावीकडे, कधी मागे, कधी समोर असे दिसतच राहिले.

आता पाऊस थांबला होता. आम्हाला उतरायचं होतं एक चिनी देऊळ पहायला. पुन्हा एकदा, त्या देवळाची रंगसंगती, वास्तुरचना सगळंच वेगळं आणि बघण्यासारखं होतं. चिनी-जपानी घरांची छपरं, देवळांचे कळस दोन्ही टोकांना कुत्र्याच्या शेपटीसारखे गुंडाळलेले दिसतात. ते आकार मला फार आवडतात....

4050-33.jpg

आणि त्यात वापरलेला भगवा आणि हिरवा रंग सुध्दा. आपल्या देवळांत देवाच्या पायाशी तुळशीपत्रं, बिल्वपत्रांच्या रुपात हिरवा रंग असतो, डोक्यावर शेंदराचा भगवा रंग असतो - तिथे देवळाच्या कळसावरच हे दोन्ही रंग विराजमान झालेले होते.
लांबवर पुन्हा ट्विन टॉवर्स नजरेस पडले. आयफ़ेल टॉवरचं वर्णन करताना पु. लं. नी 'अपूर्वाई'त लिहिलंय की पुण्यात जशी पर्वती कुठूनही दिसते तसाच आयफ़ेल टॉवर पॅरिसमध्ये कुठूनही दिसतो. त्याप्रमाणेच पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्ये कुठूनही दिसतात!
चिनी देवदर्शनानंतर मलाय राजप्रासाददर्शन होतं... पण फक्त बाहेरूनच. राजवाडा म्हटला की तो भव्य, सुंदर, स्वच्छ असायचाच - तसाच तो ही होता. आत प्रवेश नसल्यामुळे यापलिकडे त्याबद्दल काही कळू शकलं नाही.

.... 'क्वालालंपूर दर्शन' संपलेलं होतं. आता हॉटेलवर परतायची वेळ झालेली होती. पण 'हॉटेलवर परतायचं' म्हणायला आम्ही अजून आमचं तिथलं हॉटेल कुठे पाहिलं होतं. लगेच उत्सुकता जागी झाली - इथलं हॉटेल कसं असेल, आधीच्या सगळ्या हॉटेल्ससारखंच की त्यांपेक्षा जास्त चांगलं असेल वगैरे, वगैरे. जास्त विचार करावा लागला नाही, ५-१० मिनिटांत बस Hotel Pearl International च्या आवारात शिरलीच.

प्रथमदर्शनी हॉटेल एकदम झकास वाटलं. खोल्या ताब्यात मिळायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागला. दिवसभराच्या दगदगीपायी तो वेळ थोडा कंटाळवाणा गेला, शिवाय 'अजून फक्त २ दिवस, मग परतायचंय' याचीही प्रथमच जाणीव झाली पण 'खोल्या १७ व्या मजल्यावर आहेत' हे कळल्यावर पुन्हा एकदा अंगात उत्साह संचारला. लिफ़्टनं वर जाताना कळलं की पाचव्या मजल्यावर पोहण्याचा तलाव होता. आदित्यला एकदम आठवलं की गेल्या ४-५ दिवसांत त्यानं पाण्यात डुबक्या मारल्याच नव्हत्या. लगेच त्याची भुणभुण सुरू झाली. वर जाऊन सामान ठेवलं आणि आधी साहजिकच खिडक्यांचे पडदे सारले. हिरवे डोंगर, उत्तुंग इमारती, वाहनांनी भरून वाहणारे रस्ते, मावळतीला आलेला सूर्य अशी सगळी सरमिसळ दिसली. त्यात वेगळं काही नव्हतं, फक्त Bird's Eye View मिळाला सगळ्याचा आणि खरं नाविन्य त्यातच होतं. शिवाय उजवीकडे लांबवर दोन बारीक रेषांप्रमाणे भासणारे ट्विन टॉवर्स होतेच सोबतीला!! मी त्या खिडकीत बसून माझी आवडती वाफाळती कॉफ़ी प्यायले. सतराव्या मजल्यावरची खिडकी आणि हातात कॉफ़ीचा कप ... त्यादिवशी त्या कॉफ़ीनं काही निराळीच मजा आणली!!
इकडे आदित्यला खाली पाचव्या मजल्यावरचा पोहोण्याचा तलाव खिडकीतून जास्तच खुणावायला लागला होता. आता त्याच्याबरोबर जाणं भाग होतं.
तासभर पाण्यात डुबक्या मारून झाल्यावर त्याला बाहेर काढलं. तसंही संध्याकाळचे सात म्हणजे तलाव बंद होण्याची वेळ झालेलीच होती. रात्रीच्या जेवणाचं ठिकाण हॉटेलपासून थोडं लांब होतं. त्यामुळे आम्ही साडेसातलाच निघालो. त्यादिवशी प्रथमच जेवणाबरोबर ग्लासभर ताक मिळालं. त्यामुळे मजा आली जेवायला. चारही देशांपैकी फक्त मलेशियातच आम्हाला ताकदह्याचं दर्शन घडलं....

साडेदहा वाजून गेले होते. हॉटेलवर परतलो. आता रात्रीच्या अंधारात ट्विन टॉवर्सच्या त्या दोन रेषा पिवळ्या दिव्यांनी झगमगत होत्या. रस्ते अजूनही वाहतच होते. ते वाहणारे रस्ते त्या खिडकीतून बघायला इतके का छान वाटत होते ते तेव्हा माझ्या लक्षात आलं - धावणारी वाहनं दिसत होती, त्यांचे लाल-पिवळे दिवे दिसत होते पण कर्णकर्कश्श हॉर्न्स कानावर आदळत नव्हते की पेट्रोलचा, धुराचा वास नाकात शिरत नव्हता. सतरा मजल्यांच्या उंचीनं ट्रॅफ़िकसारख्या एका डोकं उठवणाऱ्या गोष्टीचं एका मनमोहक दृश्यात रुपांतर केलं होतं. तो तसा मनमोहक(!) ट्रॅफ़िक मी बराच वेळ न्याहाळत बसले होते.

.... पण त्या सगळ्यावर बोळा फिरवणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते हॉटेल आम्हाला सोडायचं होतं!!! सर्वात आवडलेल्या हॉटेलमध्ये आमचं सर्वात कमी वास्तव्य होतं. एकाच दिवसात चुटपुटींचा आकडा तीननं वाढला होता ....!!!

 तीन दिवसांत तिसरं हॉटेल ...

मलेशियातला तो आमचा तिसरा दिवस होता. आधीच्या दोन दिवसांत मलाय शब्दसंग्रहात थोडी भर पडली होती. Pintu म्हणजे 'दरवाजा', Masuk म्हणजे 'प्रवेश', Keluar म्हणजे 'बाहेर जायचा रस्ता', Dilarang Masuk म्हणजे 'प्रवेश निषिध्द' वगैरे, वगैरे. अर्थात हे ज्ञान हॉटेलमधल्या निरनिराळ्या पाट्या वाचून आलेलं होतं. कानावर पडणाऱ्या शब्दांतून मात्र कुठलाही बोध होणं कठीणंच होतं.

परतायला दोनच दिवस अवकाश होता आणि एक अप्रिय गोष्ट घडली. आमच्या गृपमधल्या एक आजी हॉटेलच्या लॉबीत पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या कंबरेला जबर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एक रात्र तिथेच रहावं लागलं. त्यांच्या कंबरेचं हाड एका ठिकाणी मोडलं होतं असं कळलं. पुढचे दोन दिवस त्यांना हॉटेलच्या खोलीतच पडून रहावं लागलं. चौदाव्या दिवसाची सुरूवात या गालबोटानंच झाली होती....

जसं गेंटींग हायलंडला एक दिवस थीम-पार्क मध्ये घालवला, तसंच त्या दिवशी 'सन-वे लगून' रिसॉर्टच्या 'वॉटर पार्क' मध्ये दिवसभर धम्माल करायची होती. पण त्यापूर्वी ते आवडलेलं हॉटेल आणि ती सतराव्या मजल्यावरची आवडलेली खोली सोडायची होती. दर एक-दोन दिवसांनी सामान उचकायचं, पुन्हा भरायचं हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. सामानसकट तिथून बसनं निघालो आणि थोड्याच वेळात त्या रिसॉर्टला पोचलो.
त्या परिसरात वेगवेगळ्या दर्जांची ४-५ हॉटेल्स होती. आमचा मुक्काम 'सन-वे पिरॅमिड' नामक हॉटेलमध्ये होता - तो ही फक्त २४ तासांसाठी.... मलेशियात आल्यापासून तीन दिवसांत आम्ही तीन हॉटेल्सचं मीठ खाल्लं होतं!!

'सन-वे लगून' हा परिसर म्हणजे दक्षिण आफ़्रिकेतल्या 'सन सिटी'ची हुबेहूब प्रतिकृति आहे असं समजलं ... तेच सन सिटी जिथे काही वर्षांपूर्वी 'मिस वर्ल्ड' स्पर्धा झाली होती, ज्याच्या विरोधात खूप निदर्शनं झाली होती आणि ज्या स्पर्धेत आपली ऐश्वर्या जिंकली होती ... असं ते शहर फक्त ऐकूनच माहीत होतं. आता मूळ कलाकृतीच पाहिलेली नसल्यामुळे तिची ही प्रतिकृति हुबेहूब आहे की नाही ते कळणार कसं? आणि तसंही, ते न कळल्यानं काही फरकही पडणार नव्हता. किमान प्रत्यक्ष त्या 'सन सिटी'ला भेट दे‍ईपर्यंत तरी!! ही नक्कल सही-सही होती किंवा कसं ते तिथे गेल्यावर ठरवता आलं असतं ... त्या क्षणी तरी 'वॉटर पार्क' वर लक्ष केंद्रित करायचं ठरवून निघालो.
'वॉटर पार्क'ला जायची वाट आमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूनं, एका ५-६ मजली चकाचक 'शॉपिंग मॉल'च्या तिसऱ्या मजल्यावरून जात होती. पूर्वीचे चौकोनी वाडे असायचे तशी काहीशी त्या मॉलची रचना होती - म्हणजे, मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी दुकानं. तळमजल्यावरच्या मोकळ्या जागेत 'फ़िगर स्केटिंग' आणि 'आईस हॉकी' खेळण्याची सोय होती. अगदी लहान-लहान मुलंसुध्दा तिथल्या गुळगुळीत बर्फाच्या पृष्ठभागावरून सहज इकडे-तिकडे करावं तशी फिरत होती, सराव करत होती. तिथला दिव्यांचा लखलखाट, झगमग, ती छानछान दुकानं, ते स्केटिंग - हे सगळं पाहून आम्ही थोडा वेळ 'वॉटर पार्क' वगैरे विसरूनच गेलो. संध्याकाळी त्या दुकानांतून एक-एक चक्कर टाकायचीच असं मनोमन ठरवून टाकलं.
त्या मॉलमधून पुढे गेल्यावर एका लिफ़्टनं सहा-सात मजले वर जाऊन मग वॉटर पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता यायचं. वाटेत ठिकठिकाणी 'काम चालू, गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत' अश्या पाट्या दिसत होत्या. पण त्या इंग्रजीतच होत्या ... त्यामुळे मलाय भाषेत दिलगिरी कशी व्यक्त करतात ते समजण्याची एक मोलाची संधी हुकली. त्या वॉटर पार्कचं आधुनिकीकरण चालू होतं. म्हणजे, 'इथे अजून काहीतरी नवीन बनतंय जे आपल्याला पहायला मिळणार नाहीये' याचीच रुखरूख तिथे शिरण्यापूर्वी !!! ... 'अजून ४-६ महिन्यांनी आलो असतो तर नव्या स्वरूपातलं वॉटर पार्क बघायला मिळालं असतं' असा विचार हटकून आलाच मनात !! जे मिळतंय त्यात आनंद मानायच्याआधीच जे हुकणार आहे त्याबद्दल हळहळ का वाटते आपल्याला?

गेंटिंग हायलंडच्या थीम-पार्कप्रमाणेच इथेही दिवसभर सगळेजण आपापली वयं विसरून चिक्कार हुंदडले. दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडे ढेपाळलो पण आदित्यचा उत्साह कायम होता. त्याला पुन्हा पाण्यात डुंबायचं होतं, उड्या मारायच्या होत्या. त्याच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून त्याला पाण्यात सोडलं आणि आम्ही काठावर बसून राहिलो आरामात. पण अर्ध्या-एक तासात आभाळ भरून आलं आणि गडगडाटासह पाऊस सुरू झाला. सर्वांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला सांगण्यात आलं.परतताना वाटेत एके ठिकाणी Sandstone Exhibition होतं ते पाहिलं.

4052-09.jpg

फ़्लॉवरच्या गड्ड्यांसारखे किंवा मश्रूमसारखे दिसणारे निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे दगड मांडून ठेवले होते आणि जोडीला आकर्षक प्रकाशयोजना केलेली होती. दगडांचे ते नैसर्गिक आकार केवळ अप्रतिम होते!!

संध्याकाळी मॉलमधून फेरफटका मारायचा निश्चय काही मजल्यांपुरता पूर्णत्वाला नेता आला. पाण्यात खेळून पाय खूप दुखायला लागले होते, त्यात तो ५-६ मजल्यांवरचा अगणित दुकानांचा पसारा ... उत्साह खूप होता पण २-३ मजले फिरून होईपर्यंत पायांनी असहकार आंदोलन सुरू केलंच!! मग हॉटेलवर परत येऊन थोडा वेळ निवांत गप्पा-टप्पा केल्या, पत्ते खेळलो. आमच्या खोलीच्या खिडकीतून खालच्या कॉफ़ी-शॉपमधला मोठा टी.व्ही.चा पडदा दिसत होता. कुठलातरी फ़ुटबॉलचा सामना चालू होता, तो पाहिला थोडा वेळ.

जेवणं झाल्यावर हॉटेलच्या बाहेर एक फेरी मारून आलो. सगळीकडे दिवाळी-ईद निमित्त अतिशय सुंदर रोषणाई केलेली दिसली.

4052-16.jpg

त्या असंख्य नाजूक दिव्यांच्या सोबतीनं निवांत फिरायला फारच छान वाटलं. सण आणि दिव्यांचा झगमगाट यांचं जगभर अतूट नातं आहे. आपल्याकडेही नवरात्रात, गणेशोत्सवात त्याच तोडीची रोषणाई असते, फक्त त्याच्या जोडीनं कर्कश्य आवाजातली गाणीही असतात जी त्यातली मजा पार घालवून टाकतात ...

हॉटेलवर परतल्यावर पुन्हा सामानाची आवराआवर करायची होती ... दुसऱ्या दिवशी परतीचा विमान-प्रवास होता. मलेशिया सोडताना थोडी रुखरुख जाणवली की थीम-पार्क, वॉटर-पार्कच्या नादात तिथल्या साध्या-साध्या गोष्टी निरखायला मिळाल्या नाहीत. पण २-३ दिवसांच्या धावत्या भेटीत दुसरं काय होणार? तसं बघितलं तर फक्त सिंगापूरच का, प्रत्येक देशात, प्रत्येक ठिकाणीच किमान आठवडाभर तरी राहता आलं पाहिजे ... जे कुणालाच शक्य नाही. मग ती दुधाची तहान अशी ताकावर भागवावी लागते ... पण निदान तेवढं तरी करायलाच हवं आणि ते आम्ही केलं होतं....
खरं म्हणजे 'दुधाची तहान ताकावर ...' असं म्हणून पंधरा दिवसांच्या अभूतपूर्व आणि अनेक अर्थांनी आनंददायी घटनांवर बोळा फिरवायची कुणाचीच इच्छा नव्हती ... !!!

 विमानंही लेट होतात ... !!

आता घरी परतायला फक्त चोवीस तास शिल्लक राहिले होते. असं वाटलं होतं की सामान आवरताना उदास-उदास वाटेल, नको परत जायला असं वाटेल .... पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही - निदान मला तरी नाही. याचाच अर्थ पंधरा दिवसांच्या त्या सहलीचा आम्ही पुरेपूर आनंद उपभोगला होता, पूर्ण समाधान मिळवलं होतं, घरी परतून पुन्हा आपापल्या कामाला लागायला आम्ही तयार होतो.
सगळं आवरून सामान घेऊन खाली आलो. निघण्यापूर्वी शेवटचं फ़ोटो काढणं सुरू होतं लोकांचं. त्यातल्यात्यात ज्यांच्याशी जास्त ओळखी झाल्या त्यांच्याबरोबर फ़ोटोंरूपी आठवणी जतन करायची सर्वांचीच इच्छा होती. पत्ते, फ़ोन नंबर, ई-मेल यांची देवाण-घेवाण सुरू होती. उत्साहाच्या भरात सुरूवातीचे काही महिने नियमित संपर्क ठेवला जातो, नंतर हळूहळू ते मागे पडत जातं हे सर्वजण मनातल्यामनात जाणून होते, तरीही सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

नेहेमीप्रमाणे बस विमानतळाच्या दिशेनं निघाली, तेव्हा लक्षात आलं की क्वालालंपूरचा विमानतळ आम्ही अजून पाहिलेलाच नव्हता. चला, म्हणजे निघायच्या दिवशी पण काहीतरी नवीन पहायचं होतंच!! अर्थात, हे सुध्दा मानण्यावर असतं. मला अजून एक नवीन विमानतळ बघण्याची उत्सुकता होती. अजून कुणाचीतरी वेगळी प्रतिक्रिया झाली असेल - इमिग्रेशन इ.ची कंटाळवाणी पध्दत आठवून कुणाचीतरी दिवसाची सुरूवातच बेकार झाली असेल.

विमानतळावर पोहोचायला ४०-५० मिनिटं लागणार होती. बसमध्ये गाणी, स्तोत्र, भजन, अभंग इ. झालं. गेल्या पंधरा दिवसांत काय-काय वाटलं ते सांगायला सौ. शिंदेंनी आदित्यच्या हातात माईक दिला. जसं निघायच्या दिवशी आदित्यनं आम्हाला आश्चर्यचकित केलं होतं तसंच परतायच्या दिवशीपण केलं. तो बोलला नेहेमीचंच, म्हणजे 'मजा आली' वगैरे पण ते ज्या पध्दतीनं बोलला त्याचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं. पन्नासएक लोकांसमोर उभं राहून ४-२ वाक्यं आत्मविश्वासानं आणि सहजतेनं बोलणं हेच महत्वाचं असतं. इतरही अश्याच गप्पा-टप्पा होईपर्यंत उतरायची वेळ आली.

इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पाचव्या मजल्यावर पार पाडायचे होते. बॅंकॉकला पण चौथ्या मजल्यावर इमिग्रेशन होतं पण रस्त्यानेच तिथपर्यंत नेऊन सोडलं होतं सगळ्यांना. इथे त्यासाठी लिफ़्ट होती. आधीच विमानतळावरची लिफ़्ट, त्यातही पारदर्शक भिंती असलेली लिफ़्ट पाहून आदित्य मूडमध्ये आला. लिफ़्टनं पाचव्या मजल्यावरच्या अवाढव्य लाऊंजमध्ये पोचलो आणि आपापल्या सामानासकट 'रांगेचा फायदा सर्वांना' या वचनाला जागत रांगा लावून उभे राहिलो. पुन्हा एकदा नकळत आपल्या विमानतळाशी तिथली तुलना सुरू झाली. आम्ही पाहिलेले हे चारही देश आकारानं भारतापेक्षा कितीतरी लहान, पण पर्यटनाला सगळीकडेच महत्व दिलेलं दिसलं. परदेशी पर्यटकांना आकर्षित करायचं तर विमानतळाकडे प्रथम लक्ष द्यायला हवं. आपण सणासुदीला दारात रांगोळ्या काढतो, गुढ्या-तोरणं उभी करतो, मांडव टाकतो .... त्याचा उद्देश हाच असतो की येणाऱ्या पाहुण्यांना घरात शिरतानाच प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम विमानतळ पाहूनच प्रसन्न वाटलं पाहिजे, त्या शितावरून ते जो देश पहायला आले आहेत त्या भाताची योग्य ती परिक्षा करता आली पाहिजे. आपल्याकडे याच्या बरोबर उलटं होत असणार यात शंका नाही. इतक्या विविधतेनं आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आपला देश, पण विमानतळाच्या भिंती आणि कोपरेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले पाहिल्यावर तशीच घाण या देशात सगळीकडे असणार अशी शंका जर एखाद्या परदेशी माणसाला आली तर त्यात त्याची काय चूक? नंतर तो काश्मिररूपी नंदनवनात जरी गेला तरी प्रथमदर्शनी बनलेलं मत सहजासहजी थोडंच बदलणार? आपल्या आणि तिथल्या विमानतळांची अंतर्गत सजावट आणि स्वच्छता यात इतकी तफावत आढळण्याचं मला जाणवलेलं मुख्य कारण म्हणजे आपले विमानतळ अजून सरकारच्या हातात आहेत आणि आम्ही पाहिलेले सगळे खाजगीकरण झालेले आहेत. कितीही नाकारायचं ठरवलं तरी फरक हा पडतोच! मुंबई-दिल्ली विमानतळांच्या खाजगीकरणाबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. 'त्याच्याशी आपला काय संबंध?' असं इतके दिवस वाटायचं. पण आता त्या नियोजित खाजगीकरणाला माझा जोरदार पाठिंबा आहे. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हे अगदी खरं आहे .... जसं 'इकॉनॉमी क्लास'च्या वंशा गेल्यावर मला त्यातला फोलपणा जाणवला होता!!! पण पुन्हा त्याच 'इकॉनॉमी क्लास'मध्ये बसून परतीचा कोलंबो पर्यंतचा पाच तासांचा प्रवास करायचा होता ज्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही तिथे रांगेत उभे होतो, क्वालालंपूरचा विमानतळ निरखत होतो. इतर आजी-आजोबांची ट्रॉलीज, बोर्डिंग पास, बॅगेज टॅग्ज, इ. साठी चाललेली धावपळ पाहत होतो. आमचे आजी-आजोबा मात्र निवांत खुर्च्यांवर गप्पा मारत बसलेले होते. कारण धावपळ करायला आम्ही दोघं होतो.

मलेशियाचं 'रिंगीट' हे चलन बदलून पुन्हा आपले रुपये घ्यायच्या निमित्तानं मी त्या सगळ्या लाऊंजभर फिरून आले. ते ऑफ़िस कुठल्याकुठे लांबवर होतं. वाटेत 'चौकशी'चा काऊंटर दिसला. तिथे खरंच चौकशी करता येत होती. विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळत होती. दोनशे-अडीचशे रिंगीट देऊन अडीच-तीन हजार रुपये हातात मिळाले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हातात रुपये खेळायला लागले होते. पूर्वापार ओळखीच्या त्या नोटा पाहून मला भरतं आलं. घरी परततोय याचा नव्यानं आनंद झाला. शेवटी कितीही झालं तरी आपलं घर ते आपलं घर आणि आपला देश तो आपला देश!!! त्या बाबतीत मी पक्की देशप्रेमी वगैरे आहे. तुलनात्मक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आहेतच पण म्हणून उद्या जर कुणी मला सिंगापूरला कायमची जाऊन रहा म्हटलं तर मला नाही वाटत मी त्याला सहजासहजी तयार होईन! पंधरा दिवसांत मी फक्त दिखाऊ गोष्टींची तुलना केलेली होती. पण अश्या वरवरच्या गोष्टींनी दोन संस्कृतींतली खरीखुरी तुलना होत नाही. जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन राहण्याची वेळ येते तेव्हा आपल्या देशाशी जन्माच्यावेळेलाच जोडले गेलेले धागे काही प्रमाणात तोडूनच जावं लागतं. तरच माणूस त्या परक्या देशाला थोड्याफार प्रमाणात आपलंसं करू शकतो. इथे तर साध्या सवयीच्या चलनी नोटा पंधरा दिवसांनी समोर आल्यावर मला आनंद झाला होता, मी कुठली ते तसे धागे तोडून वगैरे जाणार!! त्यापेक्षा हे बरं - आठ-पंधरा दिवस जा, खा, प्या, हिंडा, मजा करा, अनुभवाने समृध्द व्हा पण परतल्यावर त्या नव्या अनुभवांचा तुमच्या देशाला कसा उपयोग होईल ते बघा!! .... पण त्या क्षणी तरी आपापल्या बॅगांना नीट टॅग्ज वगैरे लावून त्या व्यवस्थित पुढे जाताहेत ना ते बघायचं होतं.

सगळं सामान गेल्यावर बोर्डिंग पासेस घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत एका ठिकाणी चक्क भारतीय पध्दतीची, संस्कारभारतीची असते तसली मोठीच्यामोठी रांगोळी काढलेली दिसली. आपल्या चलनी नोटांपाठोपाठ ती रांगोळी पाहूनही छान वाटलं. इमिग्रेशनमधून पुढे आलो. कागदोपत्री आता आम्ही मलेशिया सोडलेलं होतं. तिथून बोर्डिंग गेटपाशी एका ट्रेननं जायचं होतं. तिथली सगळी बोर्डिंग गेट्स एकमेकांपासून इतकी लांबलांब होती की तिथे जायला वेगवेगळ्या ट्रेन्स होत्या. विमानतळाच्या आत इकडे-तिकडे फिरायला ट्रेन!! नवलाई पंधरा दिवसांनंतरही संपलेली नव्हती तर!!

पुन्हा एकदा सगळे 'प्याशिंजर' फलाटावर जाऊन उभे राहिले.

4052-30.jpg

आम्हाला 'सी-४' बोर्डिंग गेटला घेऊन जाणारी ट्रेन लगेच आलीच. २-३ मिनिटांत ट्रेनमधून तिथल्या लाऊंजपर्यंत पोचलो. आता तास-दीड तास वेळ काढायचा होता. पण फारसा प्रश्न आला नाही कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर दुकानं होती. चलन बदलून घेताना ५-६ चिल्लर नाणी जवळ शिल्लक राहिली होती. ती खर्च करायच्या मोहिमेवर आता मी आणि आदित्य निघालो. चणे-शेंगदाणे गटातलं मूठभर काहीतरी मिळालं तेवढ्याचं. पण त्यातही आनंद झाला - हवी असलेली वस्तू हव्या त्या किंमतीला मिळाल्यावर होतो तसा!!! ते दाणे सगळ्यांनी वाटून खाल्ले. मग इतर दुकानांतून इकडे-तिकडे फिरत थोडा वेळ काढला. एक पुस्तकांचं दुकानही होतं. नेहेमीप्रमाणे ते मला सर्वात शेवटी दिसलं. तरीही त्यातल्या त्यात अर्धा-पाऊण तास तिथे घालवलाच! आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं पुस्तकांचं दुकान, तिथली पुस्तकंही आंतरराष्ट्रीय होती .... आणि त्यांच्या किंमतीही!!

आमच्यापैकी एका आजींनी घरातून निघताना बरोबर घेतलेले उरलेसुरले फराळाचे पदार्थ सगळ्यांत वाटून टाकले. त्यांपैकी भाजणीच्या चकलीचा एक तुकडा माझ्या वाट्याला आला. तेवढ्या एका तुकड्याने असं तोंड चाळवलं ना की विचारता सोय नाही. लगेच जाणवलं की यंदा या सहलीच्या तयारीच्या नादात फराळाचे कुठलेही पदार्थ केले अथवा खाल्ले गेले नाहीत. असेल सिंगापूर सुंदर आणि स्वच्छ पण तिथे खमंग चिवडा कुठे मिळाला आम्हाला खायला? असेल बॅंकॉकचा विमानतळ भव्य पण तिथे कुरकुरीत चविष्ट भाजणीची चकली म्हणजे काय ते कुठे कुणाला माहितीये? 'चॉकोलेट गॅलरी'त असतील भरपूर प्रकारची उंची चॉकोलेट्स पण करंजीचं गोड सारण नुसतं खातानाची मजा कुठे त्यांत ... आता तर मला घरी परतायची फारच ओढ लागली ....

दुपारी एकच्या सुमाराला प्रत्यक्ष बोर्डिंग गेटपाशी सगळे जाऊन पोचलो. समोरच्या मोठ्या काचांच्या खिडकीतून उडणारी-उतरणारी विमानं दिसत होती. पुढ्यातच आमच्या विमानात सामान चढवण्याचं काम चालू होतं. तिथली काम करणारी माणसं प्रवाश्यांच्या मोठाल्या बॅगा आत अक्षरशः दणादण फेकत होती. परदेश प्रवास, विमान प्रवास म्हणून त्या खास चाकं लावलेल्या मोठ्या बॅगांचं आम्हाला केवढं अप्रूप होतं. पण त्यांच्या दृष्टीनं ती नित्याचीच बाब होती. एकीकडे प्रवाश्यांचे सिक्युरिटी, इमिग्रेशन इ. सोपस्कार पार पडत असताना पडद्यामागे काय चाललेलं असतं ते त्या दिवशी तिथे पहायला मिळालं. वेळ मस्त गेला हे सांगायला नकोच!
'श्रीलंकन फ़्लाईट नं. यू. एल. ३१२'साठीची सूचना झळकली आणि सगळे उठलो. क्वालालंपूर खुर्दहून कोलंबो बुद्रुक मार्गे मुंबई गावठाणाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला होता.

आता विमानातल्या कुठल्याही अंतर्गत गोष्टी निरखण्यात फारसा रस नव्हता, त्यामुळे जेवणखाण झाल्यावर पाच तास काय करायचं हा प्रश्नच होता. समोर छोट्याश्या टी.व्ही.च्या एका चॅनेलवर कुठलातरी हिंदी सिनेमा सुरू झाला होता. म्हटलं चला हा टाईमपास काही वाईट नाही. पण कसलं काय ... एक-दोन मिनिटं त्या स्क्रीनकडे पाहिलं आणि मला मळमळायला लागलं! आता तर पाच तास कसे काढायचे हा अजूनच मोठा प्रश्न होता. शेवटी टाईमपासचा हुकमी मार्गच कामी आला - ऍव्हॉमिन घेतली आणि झोपायचं ठरवलं. गाढ झोप लागणं शक्यच नव्हतं पण एक-दोन डुलक्या काढल्या.
पाच तासांनी कोलंबो विमानतळावर उतरलो. घड्याळ्याचे काटे पुन्हा मागे सरकवले. पण शारिरीक घड्याळ कसं पुढे मागे करणार? पोट म्हणत होतं जेवणाची वेळ झालीये ... पण कोलंबोचं घड्याळ सांगत होतं अजून दोन तास थांबा!! ते तर थांबायचं होतंच शिवाय आमचं पुढचं विमान रात्री बारा वाजता होतं. ती प्रतिक्षा होतीच. पुन्हा त्यात तिथले रात्रीचे बारा म्हणजे आमच्या शारिरीक घड्याळांची मध्यरात्र!! एकंदर कठीण काम होतं पण मजाही वाटत होती. म्हटलं तर आम्ही त्याक्षणी कोलंबोच्या विमानतळावर होतो, पण व्हिसा नसल्यामुळे श्रीलंकेत अधिकृतरीत्या प्रवेश करू शकत नव्हतो. म्हणजे ना या देशात ना त्या देशात असे आम्ही मध्येच कुठेतरी होतो!! 'व्हिसा' वरून आठवलं - दहा दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही कोलंबोला उतरून व्हिसा घेतला तेव्हा बहुतेकांना २-३ दिवसांचाच व्हिसा मिळाला होता ... आदित्यला मात्र ३० दिवसांचा मिळाला होता. म्हणजे त्या रात्री आमच्यापैकी फक्त आदित्य कोलंबो शहरात अधिकृतरीत्या प्रवेश करू शकणार होता पण नाईलाजास्तव त्याला आमच्या बरोबर थांबणं भाग होतं ....

पुन्हा एकदा तिथल्या दुकानांतून चक्कर मारून आलो, गरमागरम कॉफ़ी प्यायली, गप्पा मारल्या, पत्ते खेळलो, गाणी म्हटली आणि कसेबसे दोन तास काढले. पहिल्या २-३ दिवसांचा अनुभव लक्षात घेता अजयनं मात्र झोप काढणं पसंत केलं. आमच्यामुळे त्या लाऊंजला एखाद्या गप्पा रंगलेल्या कट्ट्याचं स्वरूप आलं होतं! अनेक दिवस परदेशात फिरतीवर असलेला एक पुण्याचा रहिवासी आमचा सहप्रवासी होता. तिथे त्यावेळी असं अनपेक्षितपणे आणि घाऊक भावात मराठी कानावर पडल्यामुळे तो फारच खूष झाला. मराठी गप्पा ऐकून फार बरं वाटलं असं त्यानं मुद्दाम येऊन सांगितलं.

तिथल्याच एका रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. पूर्ण पंधरा दिवसांतलं ते सर्वात वाईट जेवण ठरलं. पण करणार काय - 'श्रीलंकन'च्या फुकट पॅकेजमधलाच तो एक भाग होता. 'फुकट' हवंय ना मग चावा चिवट पोळ्या, गिळा टचटचीत भात, तिखटजाळ आमटी ... भरल्या ताटावरून अर्धपोटी उठणं म्हणजे काय त्याची शब्दशः प्रचिती त्यादिवशी आली!!

अकरा वाजता पुन्हा सिक्युरिटीसाठी रांगा लावल्या. पुढे जाऊन अर्धपोटी, पेंगुळल्या डोळ्यांनी, जडावलेल्या डोक्यांनी आमच्या विमानाचा नंबर कधी येतोय त्याची वाट पाहत बसून राहिलो. बरोबर अकरा दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी पहाटेपहाटे आम्ही बॅंकॉकच्या विमानाची वाट पाहत बसलो होतो. त्यादिवशीपण झोप अपुरी झाली होती पण सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तेव्हापण भूक लागली होती पण 'बॅंकॉकला जायचंय' या विचारापुढे तो मुद्दा गौण वाटत होता. नवीन देश पहायच्या उत्सुकतेनं जडावलेलं डोकं हलकं झालं होतं. त्याक्षणी मात्र एक-एक मिनिट म्हणजे एक-एक तास वाटत होता. वेळ जाता जात नव्हता. पावणेबारा वाजता 'फ़्लाईट नं. यू. एल. १४१' ही अक्षरं नजरेस पडली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला .... पण हे काय...! त्याच्यापुढे नेहेमीचे 'Now Boarding' हे शब्द दिसलेच नाहीत - त्याऐवजी 'Delayed' हा नको असलेला शब्द येऊन डोळ्यात घुसला!!! हा मात्र सहनशक्तीचा अंतच होता. अजून एक तास??? 'अनुभवाने समृध्द' म्हणता म्हणता इतकं की आजवर फक्त बस-ट्रेन उशीरा येण्याची सवय असलेल्यांना 'विमान लेट' असण्याचा अनुभव आला होता....

तो एक तास कसा काढला ते ज्याचं तोच जाणे. मात्र बरोबर एक वाजता विमानापाशी घेऊन जाणारी बस आली. विमानात आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. आता कधी एकदा घरी जाऊन पडतोय असं झालं होतं ....

 वास्तवाची चपराक.

दोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय !!

हवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य!! ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...
जराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील!! पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...

... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी!! दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.
पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर! त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय!!

सामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली! अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या! जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत?? पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती! त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना!! पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं!!
पुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.

दूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व!

दुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........ (समाप्त)

 प्रीति छत्रे

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...