भाजाची लेणी ही पुरातन व्यापारी मार्गावर वसवलेली सुंदर लेणी आहे. पूर्वी अरबी सागरातून आलेला माल / समान दक्खन पठारावर आणण्याच्या मार्गावर वसवलेली भाजा प्रमाणेच बडसे, कार्ला ही लेणी सुद्धा जवळच आहेत. बडसे लेणं तर भाजा लेण्याच्या डोंगर रांगेतच आहे आणि कार्ला हे साधारण ५ किलोमीटर उत्तरेकडे आहे. ह्या लेण्यांसोबत लोहगड आणि विशालगड हे दोन किल्ले ही ह्याच भागात आहेत ह्यावरून पूर्वी हा मार्ग हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता हे सहज समजून येतं. जेथे व्यापारी मार्ग होते, तिथे तिथे लेणी, विहार खोदले जायचे. .घाटमाथा व कोकण ही सह्याद्री ची दोन रूपं, आणि त्यांना जोडणारे जे काही घाटमार्ग आहेत उदा. कसारा, मालशेज, बोरघाट किंवा खंडाळा घाट, ताम्हाणी, वरंध, आंबेनळी, आंबाघाट, फोंडाघाट ह्या घाट चढताना वाटेत इतरत्र आपणास लेणी खोदलेली आढळतील. भाजाची लेणी भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकार क्षेत्रात येतात
ही लेणी इसवीसन पूर्व २ शतकातील आहेत पुढे ही साधारण ८ शतकं ह्या लेण्यां मध्ये भर पडत राहीली आणि लेणी विस्तारत गेली. इतकी पुरातन लेणी आणि त्याकाळी केलेले ते कोरीवकाम बघून मती गुंग होवून जाते. ही लेणी हीनयान पद्धतीची असून त्यात एकूण २२ लेणी कोरली आहेत, त्यातील एक चैत्यगृह असून बाकी एकवीस विहार आहेत.
भारतातील हे सर्वात जुने चैत्यगृह आज २२०० पेक्षाही अधिक जुनं असूनही खूपच चांगल्या परिस्थितीत बघायला मिळतं. चैत्यगृह हे प्रमुख लेण म्हणता येईल हे सत्तावीस अष्टकोनी खांबांवर तोललेलं आहे आणि ह्या खांबांवर कमळ, चक्र ही चिन्हे कोरलेली दिसतात. साधारण आठ उपलब्ध शिलेलेखापैकी एका पाण्याच्या टाक्यात असलेल्या लेखात दान करणाऱ्याच नाव “महारथी कोशिकीपुत विह्नुदत” असं सापडतं. ह्या चैत्यागृहात प्रमुख स्तूप आहे. जसा इतर लेण्यांच्या चैत्यागृहात आढळतो. चैत्यागृहाला लाकडी तुळयांचे छत बनवलेलं आहे आणि ही लाकडं सुद्धा २२०० वर्ष जुनी असून ही अजून शाबूत आहेत. हे खरोकर आश्चर्य म्हणावं लागेल ह्या लाकडात ही ब्राम्ही लिपीमध्ये काही लेख आहेत. आज चैत्यगृह हे उघड आहे पण पूर्वी दगडातील भोकं दर्शवतात की चैत्यागृहाला लाकडी दरवाजा असावा.
ह्या लेण्यांमध्ये १४ स्तुपाचा एक समूह ही बघायला मिळतो. ह्यातील ५ स्तूप लेण्याच्या आत तर ९ स्तूप बाहेर अशी रचना आहे. ह्या स्तूपात तिथे राहणाऱ्या भिक्षुं चे अवशेष आहेत. स्तुपावर अम्पानिका, धम्मागिरी आणि संघदिना अशी भिक्षूंची नावं सुद्धा दिसतात. दोन स्तुपावर अवशेष ठेवण्यासाठी कोरीव दगडी खोके ही दिसतात
सूर्य लेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्यामध्ये सूर्यदेव रथावर स्वर होऊन दानवांना तुडवत जातांनाचा देखावा आहे तर एका ठिकाणी इंद्र देवा हत्तीवर आरूढ झालेले दिसतात
खोलीच्या दरवाज्यावर अप्रतिम शस्त्रधारी द्वारपाल
दिसतात. व्हरांडा मग एक दालन आणि त्याला आत आणि काही खोल्या अशी ह्या विहाराची
मांडणी आहे पण ह्यातील नक्षीकाम फारच सुंदर आहे. एका शिल्पामध्ये नृत्य वाद्य
कार्यक्रमाचं दृशा आहे आणि त्यात तबला हे वाद्य दिसतं आहे. तबला वाद्य इतके जुने
असल्याचा हा एका ठळक पुरावाच आहे
असे हे भारतातील प्रथम बौद्ध चैत्यगृह,
२२०० वर्ष जुन्या लाकडाच्या तुळया आणि अप्रतिम कोरीवकाम, तबला वाद्याचा
अधिकृत पुरातन पुरावा आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि भारतीय पुरातन खाते
ह्याची देखभाल करत आहे.
अगदी मामुली ५ रुपये प्रवेश शुल्क आहे.
पावसाळ्यात ह्या लेण्यांचा खाली एक मस्त धबधबा कोसळतो आणि मग पावसाळी सहली ला जाणाऱ्यांची तोबा गर्दी होते. गाडी पार्किंग साठी ग्रामपंचायत २० रुपये चार्ज घेते. नक्की खास जाऊन बघावं असं हे लेण. मालवली रेल्वे स्टेशना पासूनचा मार्ग गुगल नकाश्यात दाखवला आहे
भाजे लेणी. आंबेनळी, वाघजाई प्राचीन घाटवाटांच्या माथ्यावर मळवलीनजीक वसलेला महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन लेणीसमूह. ह्या पूर्वीच्या लेखात भाजे लेणीचा परिचय करून दिलाच आहे. त्यात ओझरता उल्लेख केलेल्या सूर्यगुंफेतील गूढ शिल्पाचा सविस्तर परिचय करून देण्याचा आता प्रयत्न करत आहे.
सूर्यगुंफा ही भाजे लेणीतील क्र.२० ची लेणी. जवळजवळ शेवटी असलेली. ओसरी,
ओसरीवर असलेले खांब आणि आतमध्ये प्रशस्त विहार अशी याची रचना. ओसरीतच
डाव्या बाजूच्या असलेल्या कक्षाच्या दोन्हीही बाजूंना हे शिल्पपट कोरलेले
आहेत.
भारतीय शिल्पकलेतील हे एक सर्वाधिक चर्चेत असलेले शिल्प.
१. सूर्यगुंफा बाहेरून
डावीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष दोन स्त्रियांसहित चार घोडे असलेल्या रथातून एका वस्त्ररहित विशाल राक्षसीच्या अंगावरून दौडताना दिसतो.रा़क्षसीचे पाय हे उलट्या बाजूला वळलेले दाखविले आहेत. स्त्रियांपैकी एकीच्या हातात आहे छ्त्र तर दुसरीच्या हातात चामर. त्यांच्याबरोबरच काही अश्वारूढ स्त्रियाही दौडताना दिसतात. त्यापैकी एकीच्या पायात रिकीब दिसते. रिकीबीचे हे जगातील सर्वात प्राचीन दृश्य. भोवताली काही प्राणी सुद्धा कोरलेले आहेत.
२. डावीकडील शिल्पपट
३.रथाखाली तुडविली जाणारी राक्षसी
४. रिकीबीचे दृश्य(अत्यंत अस्पष्ट आहे)
उजवीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष हत्तीवरून जाताना दिसतो. त्याच्या मागे त्याचा सेवक हातात ध्वज धरून बसला आहे. हत्तीने त्याच्या सोंडेत एक झाड उपटून धरले आहे. ह्या शिल्पपटाच्या आजूबाजूला तर असंख्य शिल्पे कोरलेली आहेत. हत्तीच्या पायापाशीच पुढेच एक भव्य वृक्ष दाखवला असून त्याच्या शेंड्यांवर नगरजन विहरत आहेत. खालच्या बाजूला नर्तिका नृत्यमुद्रेत आहे. शेजारीच एक स्त्री तबला वाजवताना दाखवली आहे. त्यापुढे अनेक नगरजन विविध भावमुद्रांमध्ये दाखविलेले आहेत. इथेही हत्ती, गाय, सिंह इ. प्राणी कोरलेले आहेत. यातले तबल्याचे शिल्पसुद्धा फार महत्वाचे. तबल्याच्या अविष्काराचे श्रेय १३ व्या शतकातल्या अमिर खुस्रोकडे जाते. पण हे शिल्प बहुत प्राचीन. सुमारे २००० वर्षांपूर्वीचे. नि:संशय भारतीय जनकत्व सिद्ध करणारे.
५. गजारूढ राजा(सर्वात पुढे हत्तीच्या पायाजवळ विशाल वृक्ष व त्याच्या शेंड्यांवर बागडत असलेले प्रजानन आहेत.)
६. झाड सोंडेत पकडलेला हत्ती
७. विलासी नगरजन
८. तबल्याचे सर्वात प्राचीन दृश्य.
ह्या दोन्ही शिल्पपटांचा अर्थ आतापर्यंत वेगवेगळा लावला गेलाय. कुणी
म्हणतात हे सूर्य आणि इंद्राचे शिल्प असावे. नाणेघाटातल्या शिलालेखात
सूर्य, इंद्राला वंदन केलेले आहे. सूर्याच्या रथाचे घोडे जरी सात असले तरी
प्राचीन काळच्या शिल्पांत ते चारच दाखवले जात. त्या दोन स्त्रियांना
सूर्यपत्नी संज्ञा आणि छाया यांची उपमा दिलेली आहे. अधःकाररूपी राक्षसीचा
तो जणू नाश करतच चाललेला आहे.
उजवीकडच्या शिल्पपटाला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राची उपमा दिलेली आहे. व सर्व नगरजन ही इंद्रप्रजा दर्शविली आहे.
पण बौद्ध लेण्यांत ही संकल्पना मान्य होण्याजोगी नाही. कारण ही लेणी
सातवाहनांनी स्वतः खोदवलेली नाहीत तर त्यांच्या राजाश्रयाखाली बौद्ध
श्रमणांनी खोदलेली आहेत.
कुणी म्हणतात की रथातून चाललेला राजा हा स्वत: गौतम बुद्ध असून गजारूढ
योद्धा बुद्धशत्रू मार दाखवला आहे. पण मार हा शत्रू असूनही त्यांच्या
युद्धकथांचे दाखले मिळत नाही.गौतमाला ज्ञानप्राप्ती होण्याच्या आधी त्याला
निरनिराळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्याला मायेत गुंतवण्याचा प्रयत्न
करणारा असेच माराचे स्वरूप निरनिराळ्या कथांत दाखवलेले आहे.
शिवाय हे शिल्प हिनयानकाळातले. त्याकाळी बुद्धाच्या मूर्तीपूजेला मान्यता
नसल्याने ह्या शिल्पपटांचा हाही अर्थ मागे पडतो. मग हे शिल्प नेमके असावे
तरी कशाचे.
काही संशोधकांनी एक वेगळीच उपपत्ती मांडली आहे. ह्या शिल्पपटांचा संबंध त्यांनी मांधाता राजाच्या प्राचीन कथेशी जोडला आहे.
महाभारत, बौद्ध जातक कथा, दिव्यावदान इ. साहित्यात उत्तर कुरु देशाचे वर्णन
अत्यंत सुखी, समृद्द, कलाप्रिय व विलासी जनांचे निवासस्थान म्हणून आले
आहे. मांधाता राजाने पृथ्वी पादाक्रांत केल्यावर मेरू पर्वतावरील उत्तर
कुरुंचे राज्य जिंकण्याचा निश्चय केला. उजवीकडच्या शिल्पपटात तो हत्तीवर
बसून उत्तर कुरुंवर स्वारी करण्यासाठी जाताना दाखवला आहे. त्या शिल्पपटाला
पार्श्वभूमी म्हणून उत्तर कुरुंचे विलासी सुखी जीवन कोरलेले आहे.
पुढ्यातल्या वृक्षाला कल्पवृक्ष असे मानण्यात आले आहे. इच्छा करताच सर्व
उपभोग्य वस्तूंची-अलंकार, खाद्यपेये, वाद्ये इत्यादींची प्राप्ती
झाल्यामुळे त्यांचे विलासी जीवन हे तिथल्या विविध शिल्पांद्वारे दर्शवलेले
आहे. तर डावीकडच्या शिल्पपटात मांधाता देवासुरांच्या संग्रामात इंद्राच्या
मदतीला बाजूने भाग घेण्याकरिता आकाशमार्गाने वाटेतल्या असुरांचा नाश करत
जात असता दाखवलेला आहे.असुरांवर जय मिळवून मांधात्याने इंद्राच्या सुधर्मा
सभेत प्रवेश केला असे दिव्यावदानात म्हटले आहे.
मांधात्याची ही कथा बौद्धांमध्ये फार प्रसिद्ध होती. अमरावतीच्या (प्राचीन
नाव धेनुकाटक-आंध्र प्रदेश) स्तुपातल्या कठड्यावर इंद्राने मांधात्याचा
सत्कार केल्याचे तसेच मांधात्याचे इंद्रपदाच्या लोभामुळे स्वर्गपतन
झाल्याचे दर्शवले आहे.
ही दोन्ही लेणी समकालीन असल्याने भाजेतील शिल्पपट हा मांधात्याच्या कथेचा असण्याची उपपत्ती अधिक ग्राह्य मानली जाते.
९. अमरावतील स्तूपाचे दृश्य (विकीपेडीयाच्या सौजन्याने)
भाजे लेणीतील सूर्यगुंफेतील हा गूढ शिल्पपट आवर्जून बघावा असाच. अत्यंत प्राचीन असे हे लेणे आजही सालंकृतपणे सज्ज आहे.








No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.